admin – || जय सद्गुरू || https://www.sadguruvani.in Thu, 29 Feb 2024 06:47:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.sadguruvani.in/wp-content/uploads/2024/01/cropped-OMKAR-2-32x32.png admin – || जय सद्गुरू || https://www.sadguruvani.in 32 32 ॥ श्रीमत् दासबोध ॥ https://www.sadguruvani.in/%e0%a5%a5-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a5%a5/ https://www.sadguruvani.in/%e0%a5%a5-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a5%a5/#respond Thu, 01 Feb 2024 09:16:51 +0000 https://www.sadguruvani.in/?p=1185

                                                                   ॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ स्तवननाम दशक प्रथम ॥ १ ॥

समास पहिला : ग्रंथारंभ

॥ श्रीराम ॥

श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥
ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्‌गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की, आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे? (१)
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥
या प्रश्नावर समर्थ सांगतात की, या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरूशिष्यांच्या संवादातून भक्तिमार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. (२)
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥
नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून, विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे. (३)
भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥
भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. (४)
मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥
मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे निःसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे. (५)
शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥
या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्यमुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी, यांविषयी ठाम मते मांडली गेली आहेत. (६)
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥
शुद्ध स्वरूपस्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निःसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. (७)
मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥
मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे निःसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे. (८)
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥
मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो, हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. (९)
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥
या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे. (१०)
मायोद्भतवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥
मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे. (११)
नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥
नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. (१२)
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥
या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केलेगेले आहे. पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल. (१३)
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥
तथापि एवढे म्हणता येईल की, हा ग्रंथ वीस दशकांत विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात दहा समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे, त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे. (१४)
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥
हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचीती व आत्मप्रचीतीच्या आधारे लिहिला गेला आहे. (१५)
नाना समती‍अन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥
खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. (१६)
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वा क्यें ॥ १७॥
जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात, त्यांच्या हे लक्षातच येत नाही की, असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवद्‌वचनाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे, त्यांनाही ते मिथ्या ठरवीत असतात. (१७)
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८॥
भगवद्गीतता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाकक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २०॥
शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत, भगवद्‌गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश्णीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवद्‌वचनाच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. (१८-२०)
भगवद्वाचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे ।
भगवद्वाकक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१॥
भगवद्‌वचनास अनुसरूनच येथे विषयप्रतिपादन केले आहे आणि भगवद्‌वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल, असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे ? (२१)
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥
संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत, असे मानून त्यास नावे ठेवतो, तो केवळ दुरभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. (२२)
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥
वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. (२३)
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥
अशा रीतीने कामक्रोध बळावले, म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. (२४)
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥
जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो, त्यास भला कसे बरे म्हणावे ? अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे; पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का ? (२५)
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥
बरे आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे. (२६)
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७॥
ग्रंथारंभी श्रोत्यांनी ‘या ग्रंथात काय आहे ?’ असा जो प्रश्न केला होता, त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. (२७)
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥
आता ‘हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते ?’ या प्रश्नाचे उत्तर असे की, हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो. (२८)
मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥
कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्‍नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्यमुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते. (२९)
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥
अज्ञान, दुःख, विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते. हीच याची फलश्रुती होय. (३०)
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥
योगी ज्याला परमभाग्य मानतात, ते वैराग्य अंगी बाणते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. (३१)
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥
जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात, ते सुलक्षणी, चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळप्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. (३२)
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥
जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात, जे कुणी पापी होते, त्यांना कृतकर्माचा पश्चात्ताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कुणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात, ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. (३३)
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४॥
बद्ध असतात, ते ग्रंथश्रवणाने मुमुक्षू बनतात. मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्तिमार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात. (३४)
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥
केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते (३५)
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६॥
श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान (दुख शोकदि) तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग (अर्थात त्रिताप, पंचक्लेशादी) नष्ट होतात. (३६)
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥
या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की, केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच; शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते. (३७)
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥
ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी, वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. (३८)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला ॥ १॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे
‘ग्रंथारंभलक्षणनाम ‘ समास पहिला समाप्त.

समास दुसरा : गणेशस्तवन

॥ श्रीराम ॥

ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका ।
अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥
सर्वसिद्धींचा फळदाता, अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करतो. (१)
माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।
मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥
आपण माझे अंतःकरणास व्यापून सर्वकाळ तेथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपाकटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वदवून घ्यावा. (२)
तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।
आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥
तुझ्या कृपेच्या योगे भ्रांतीची पटले वितळून जातात. एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो. (३)
येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं ।
हो‍ऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥
गणेशाची कृपा झाली की विघ्ने चळचळा कापू लागतात. त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात. (४)
म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर ।
आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥
म्हणूनच गजाननाला ‘विघ्नहर’ नावाने संबोधले जाते. आमच्यासारख्या अनाथांना त्याचा मोठाच आधार वाटतो. हरिहरादी देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात. (५)
वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी ।
आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥
सर्व मंगलाचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यांत सर्वप्रकारे यश प्राप्त होते. ते करीत असताना संकटे ,अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही. (६)
जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान ।
नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥
मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले, तरीही मनाला परम समाधान वाटते. चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते. (७)
सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव ।
नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥
गणेशाच्या सगुण रूपाचे लावण्य व कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून तो जेव्हा नृत्य करू लागतो, तेव्हा सर्व देव देहभान विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहातच राहातात. (८)
सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत ।
हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥
त्याच्या गंडस्थळातून सतत मद गळत असतो, तो सदा आनंदाने डुलत असतो व अत्यंत आनंदाने उल्लसित झालेले त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेते. (९)
भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड ।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥
त्याचे रूप भव्य, दिव्य असून, देह अत्यंत विशाल व महाप्रचंड आहे. त्याचा भालप्रदेश विस्तीर्ण असून, त्यावर सिंदूर लावलेला आहे. (१०)
नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें ।
तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥
त्याच्या गंडस्थळातून थबथबा मदस्राव होत असतो व त्या मदस्रावातून दरवळणाऱ्या सुगंधांच्या परिमळामुळे आकर्षिले जाऊन भुंग्यांचे थवे मधुर गुंजारव करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात. (११)
मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥
गणेशाची सोंड सोटासारखी सरळ पण टोकास मुरडलेली आहे. कपाळावर दोन सुंदर आवाळे शोभत असतात. खालचा ओठ जरा लोंबत असतो आणि उग्र गंध असलेला मद क्षणक्षणाला गळत असतो. (१२)
चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥
गणेश हा चौदा विद्यांचा स्वामी असून, त्याचे डोळे फार लहान आहेत. त्या सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहात असतो. त्याचे कान खूप मोठे व लवलवित असून, त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो, तेव्हा त्यांचा फडफड आवाज येतो. (१३)
रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥
त्याच्या मस्तकावर नाना रत्ने ज्यांत जडविलेली आहेत, असा रत्नजडित मुकुट आहे व त्यातून नाना रंगांच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतात. कानात नीलमण्यांनी जडलेली कुंडले झगमगत असतात. (१४)
दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५॥
त्याचे दात पांढरे शुभ्र व ठसठशीत आहेत आणि त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडित कडी बसवलेली असून, त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात. (१५)
लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६॥
त्याचे पोट लवलवीत असून सारखे हालत असते व त्याला सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगुरांचा मंद मंद मधुर ध्वनी ऐकू येतो. (१६)
चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पितांबर ।
फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७॥
त्याला चार हात असून लंबोदरावर सोनसळी पीतांबर नेसलेला आहे, तर पोटावरील मोठा नाग सारखे फूत्कार यकतो. (१७)
डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी ।
उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८॥
तो नाग कमरेला वेढा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभिकमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिभल्या चाटत सर्वत्र टकमका पाहतो. (१८)
नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां ।
रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे ॥ १९॥
त्याच्या गळ्यात विविध जातीच्या फुलांच्या माळा कमरेतील सापापर्यंत पोहोचतील अशा लांबलचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडित हारांतील पदक अत्यंत शोभून दिसते. (१९)
शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥ २०॥
चारी हातांपैकी एका हातात परशू , एका हातात कमळ, एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो. (२०)
नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥
गणेश हा नृत्य, नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल असून टाळ, मृदंगाच्या तालावर नृत्याचे उपांग जे हुंकार ते करीत नानाप्रकारे नृत्य करतो. (२१)
स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण ।
साअजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥
इतका विशाल व थुलथुलीत देह असूनही चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरही स्वस्थ राहात नाही. त्याची साजिरी मूर्ती सुलक्षण व लवण्याची जणू खाणच आहे. (२२)
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पा‍उलें दोनी ॥ २३॥
पायांत नूपुरे रुणझुणत असतात, दंडांतील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो, तर मधुर झंकारणार्‍या घागऱ्यांमुळे दोन्ही पाउले भक्तांचे मन हरण करीत असतात. (२३)
ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा ।
साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥
गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते. त्याच्या कृपेमुळेच साहित्य निर्मितीच्यावेळी अष्टनायिका साह्य करू लागतात. (२४)
ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु ।
त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥
श्री समर्थ म्हणतात, असा जो सर्वांगाने सुंदर असणारा, सकळ विद्यांचे वसतिस्थान असा श्रीगणेश त्यास मी साष्टांग भावाने नमस्कार करतो. (२५)
ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६॥
त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित- चित्त माणसाच्या बुद्धीतही ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते. (२६)
जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७॥
ज्यास ब्रह्मादी देवही वंदन करतात, त्यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत ? म्हणून मंदमती असणारांनीही श्रीगणेशाचे चिंतन करावे. (२७)
जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण ।
तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८॥
कारण जे कुणी मूर्ख अवलक्षणी, अथवा हीनांहूनही हीन असतील, तेही श्रीगणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व विषयांत पारंगत होऊ शकतात. (२८)
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥ २९॥
असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे. त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते. कलियुगात देवी (चंडी) व गणेशाची उपासना करावी, असे शास्त्र सांगते. (२९)
ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति ।
वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥ ३०॥
म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे. (३०)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गणेशस्तवननाम समास दुसरा ॥ २ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवाादे
‘गणेशस्तवननाम’ समास दुसरा समाप्त.

समास तिसरा : शारदास्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता ।
शब्दमूल वाग्देवता । माहं माया ॥ १॥
मी आता वेदांची जननी, ब्रह्मदेवांची कन्या, शब्दब्रह्माची उत्पत्ती जिच्यापासून झाली त्या वाग्‌देवतारूपी महामायेला, श्रीशारदेला वंदन करतो. (१)
जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार ।
जे शब्दाचें अभ्यांतर । उकलून दावी ॥ २॥
तिच्यापासूनच शब्द स्फुरतात व वैखरी वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो. तीच शब्दांचे विविध अर्थ उकलून दाखवते. (२)
जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी ।
जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ ३॥
योग्यांच्या ठिकाणी समाधिरूपाने तर धैर्यवान पुरुषांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून स्वरूपी लीन करते. (३)
जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या ।
जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ ४॥
ती ईश्वराची भार्या असून प्रत्यगात्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्थाही तीच आहे. तिच्या आधारानेच साधुपुरुष महान कार्ये करण्यास प्रवृत्त होतात. (४)
जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती ।
जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ ५॥
ती महंताची शांती असून ईश्वराची निजशक्ती आहे, तर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्तिरूपाने प्रगटून नैराश्य रूपाने शोभत असते. (५)
जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी ।
आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥ ६॥
ती सहज लीलाविनोदरूपाने अनंत ब्रह्मांडांची उत्पत्ती व लयही करीत असते; पण आपण स्वतः मात्र आदिपुरुषाच्या ठिकाणी लपून राहते. (६)
जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे ।
जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७॥
हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व हे तिचेच रूप आहे असे भासते, पण तिचा शोध घेऊ गेले असता ती कोठेच सापडत नाही. अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही. (७)
जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा ।
जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८॥
या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधार असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरलेली निर्मल ‘एकोऽहं’ ही जाणीव हे तिचेच स्वरूप आहे. तीच साधकांच्या ठिकाणी ज्ञानशक्तिरूपाने प्रगट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देते. (८)
जे लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा ।
जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ॥ ९॥
जगातील सर्व लवण्याचे, सौंदर्याचे, शोभेचे ती उत्पत्तिस्थान असून, परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे. आपल्या अचिंत्य अशा शब्दशक्तीच्या साहाय्याने ही विश्वाभासरूपी संसार नाहीसा करून टाकते. (९)
जे मोक्षश्रिया माहांमंगळा । जे सत्रावी जीवनकळा ।
हे सत्त्वलीळा सुसीतळा । लावण्यखाणी ॥ १०॥
तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी सत्रावी जीवनकळा आहे. लावण्याची खाण अशी ही शारदा परम सुशीतल व सत्त्वशील असून जीवास सुख देणारी आहे. (१०)
जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ती ।
जे कळीकाळाची नियंती । सद्गु रुकृपा ॥ ११॥
अव्यक्त अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या साहाय्याने अत्यंत विस्तार पावली आहे. कळिकाळावरही सत्ता गाजविणाऱ्या सद्‌गुरुकृपेच्या रूपाने ती कार्यान्वित होते. (११)
जे परमार्थमार्गींचा विचार- । निवडून, दावी सारासार ।
भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळें ॥ १२॥
तीच सारासार विवेकरूपाने परमार्थमार्गात मार्गदर्शन करून शब्दांच्या आधारे भवसिंधूतून पैलतीरास पोहोचविते. (१२)
ऐसी बहुवेषें नटली । माया शारदा येकली ।
सिद्धचि अंतरी संचली । चतुर्विधा प्रकारें ॥ १३॥
अशाप्रकारे विविध वेषांनी ती नटलेली दिसली, तरी ती शारदा मायारूपाने एकच असून सिद्धपुरुषांच्या ठिकाणी ती परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चार वाणींच्या रूपाने वास्तव्य करून असते. (१३)
तींहीं वाचा अंतरीं आलें । तें वैखरिया प्रगट केलें ।
म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें । तें शारदागुणें ॥ १४॥
परा, पश्यंती, मध्यमा यांच्यात जे स्फुरते, तेच वैखरी वाणीने प्रगट केले जाते. म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेच प्रगट होत असते, हे जाणून घ्यावे. (१४)
जे ब्रह्मादिकांची जननी । हरीहर जयेपासुनी ।
सृष्टिरचना लोक तिनी । विस्तार जयेचा ॥ १५॥
अशी ही मूळमाया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासूनच विष्णू शंकरादी देव व तिन्ही लोकांची सृष्टिरचना होत असते. हा सर्व तिचाच विस्तार आहे. (१५)
जे परमार्थाचें मूळ । नांतरी सद्विद्याची केवळ ।
निवांत निर्मळ निश्चळ । स्वरूपस्थिती ॥ १६॥
जिला सद्‌विद्या असे म्हणतात, जी निर्मळ, निश्चळ निवांत (शांतिरूप) परमार्थाचे मूळच अशी स्वरूपस्थिती, ती म्हणजे शारदाच होय. (१६)
जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं ।
जे सिद्धांचे अंतःकर्णीं । समाधिरूपें ॥ १७॥
योग्यांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने, साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूपचिंतनाच्या रूपाने तर सिद्धांच्या अंतःकरणात समाधिरूपाने तीच राहते. (१७)
जे निर्गुणाची वोळखण । जे अनुभवाची खूण ।
जे व्यापकपणें संपूर्ण । सर्वांघटीं ॥ १८॥
ती चराचरांत संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपाच्या अनुभवाच्या योगे तीच निर्गुणाचा परिचय करून देते. (१८)
शास्त्रें पुराणें वेद श्रुति । अखंड जयेचें स्तवन करिती ।
नाना रूपीं जयेसी स्तविती । प्राणीमात्र ॥ १९॥
शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती अखंड तिचीच स्तुती करत असतात व सर्व प्राणिमात्रही नाना रूपाने तिचेच गुणगान करतात. (१९)
जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरोपमाची उपमा ।
जयेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २०॥
वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून ज्या परमात्म्याचे शब्दांत वर्णन होऊच शकत नाही, त्याचे उपमा-दृष्टांताच्या सहाय्याने वर्णन करून त्यास ‘परमात्मा’ हे नाव देणारी ही शारदाच आहे. (२०)
नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयाची बुद्धी ।
जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञेप्तीमात्र ॥ २१॥
परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीवरूपाने स्फुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हेच शारदेचे मूळरूप असून तीच नंतर नाना विद्या, नाना कला, नाना सिद्धी व नाना मतांसंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रगट होत असते. (२१)
जे हरिभक्तांची निजभक्ती । अंतरनिष्ठांची अंतरस्तिथी ।
जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायोज्यता ते ॥ २२॥
तीच हरिभक्तांच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने, अंतर्निष्ठांच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञाननिष्ठेच्या रूपाने तर जीवन्मुक्तांच्या ठिकाणी मुक्तिरूपाने वास करते व सायुज्यमुक्ती हेही तिचेच रूप आहे. (२२)
जे अनंत माया वैष्णवी । न कळे नाटक लाघवी ।
जे थोराथोरासी गोवी । जाणपणें ॥ २३॥
शारदा म्हणजे भगवंताची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लाघवी व नाट्यकलेत निपुण आहे. मोठमोठ्यांना ‘मी ज्ञाता’ या अभिमानाच्या जाणिवेत, मोहात ती गुंतविते. (२३)
जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दें वोळखिलें ।
जें जें मनास भासलें । तितुकें रूप जयेचें ॥ २४॥
जे जे काही दृष्टीस दिसते, नादरूपाने ऐकू येते वा जे जे मनाने कल्पिले जाते अर्थात जेथपर्यंत इंद्रियांची, मनाची धाव पोहोचते, ते सर्व मायेचे रूप समजावे. (२४)
स्तवन भजन भक्ति भाव । मायेंवाचून नाहीं ठाव ।
या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २५॥
अर्थात आपण जे जे काही स्तवन, भजन, साधन, भक्तिभाव इत्यादी करतो, तेही मायेचेच स्वरूप असून मायेखेरीज तेथे इतर काही नाही. या बोलण्यातील गूढार्थ जे स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील तेच जाणू शकतील. (२५)
म्हणौनी थोराहुनि थोर । जे ईश्वराचा ईश्वर ।
तयेसी माझा नमस्कार । तदांशेंचि आतां ॥ २६॥
म्हणून शेवटी थोराहूनही थोर व ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंशरूपानेच मी आता नमस्कार करतो. (२६)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शारदास्तवननाम समास तिसरा ॥ ३॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे
‘शारदास्तवननाम’ समास तिसरा समाप्त

समास चवथा : सद्‌गुरुस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां सद्‌गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ।
तें स्वरूप मज अज्ञाना । काये कळे ॥ १॥
मला सद्‌गुरूंचे स्तवन करावे अशी इच्छा तर आहे, पण ज्यांच्यापर्यंत माया पोहोचू शकत नाही, अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार ? म्हणून सद्‌गुरूचे वर्णन करताच येत नाही, असे म्हणावे लागत आहे. (१)
न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती ।
तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २॥
श्रुती ही आत्मविद्येची जननी असून ती सुद्धा ‘नेति नेति’ मला कळत नाही, कळत नाही असे ज्याच्याविषयी म्हणते, त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी समर्थ असेल ? (२)
मज न कळे हा विचारु । दुर्ह्हूनि माझा नमस्कारु ।
गुरुदेवा पैलपारु । पाववीं मज ॥ ३॥
तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हांला दुरूनच नमस्कार करून प्रार्थना करतो की, हे गुरुदेवा, मला पैलतीरास न्या. (३)
होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा ।
असाल तैसे असा । सद्गुलरु स्वामी ॥ ४॥
मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी अयोग्य आशा मी मनाशी बाळगली होती, पण माया आपणास स्पर्शच करू शकत नसल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झाला आहे. म्हणून ‘हे सद्‌गुरू स्वामी, तुम्ही असाल तसे असा’ एवढेच मी म्हणतो. (४)
मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन ।
माया जाली लज्यायमान । काय करूं ॥ ५॥
मायेच्या साहाय्याने आपले स्तवन करावे अशी इच्छा माझ्या मनात होती. पण मायाच लाजून बाजूस सरल्यावर मी तरी काय करू ? (५)
नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनी करावी लागे प्रतिमा ।
तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुुरूचा ॥ ६॥
मुख्य परमात्मा इंद्रियगोचर नसल्याने तो हाती गवसत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो. म्हणून आता त्या मायेचा आधार घेऊनच मी सद्‌गुरूचा महिमा वर्णन करीन. (६)
आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं ।
तैसा सद्गुारु हा स्तवनीं । स्तऊं ॥ ७॥
आपल्या मनात जसा भाव असेल त्यास अनुसरूनच ध्यानात मनाने आपल्या इष्ट देवाचे स्मरण करावे लागते. तशी माझ्या मनात जशी सद्‌गुरूची मूर्ती स्थिरावली आहे, तशीच ती आठवून त्या श्रीसद्‌गुरूचे मी स्तवन करतो. (७)
जय जया जि सद्गुखरुराजा । विश्वंभरा बिश्वबीजा ।
परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८॥
हे सद्‌गुरुराजा, तुझा जयजयकार असो ! तूच सर्व विश्वास व्यापले आहेस, तूच विश्वाचे मूळ कारण आहेस व तूच परमपुरुष आहेस; तसेच मोक्ष देणारा व दीनांचा बंधू तूच आहेस. (८)
तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे ।
जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९॥
जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो, तशी तुझी कृपा झाली की अनावर अशी मायाही ओसरू लागते. (९)
आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे ।
नीसी जालियां नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १०॥
सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला, तरी रात्र झाली की परत काळोखाने ब्रह्मांड भरून जाते. (१०)
तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव ।
समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११॥
पण सद्‌गुरू स्वामीराज तसे नाहीत. ते अज्ञानाचा समूळ नाश करतात व त्यामुळे परत जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावे लागत नाही. (११)
सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२॥
परीसस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की, ते परत लोखंड कधीच होत नाही. त्याप्रमाणे गुरूंनी आपल्या दासाचे अज्ञान एकदा समूळ नष्ट केले की, तो परत कधीही संशयात पडत नाही. (१२)
कां सरिता गंगेसी मिळाली । मिळणी होतां गंगा जली ।
मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३॥
किंवा नदी एकदा गंगेस मिळाली की त्यासरशी ती गंगाच बनते. मग कितीही प्रयत्न केले तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकतच नाही. (१३)
परी ते सरिता मिळणीमागें । वाहाळ मानिजेत जगें ।
तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥ १४॥
एखाद्या ओहोळाला नदीला मिळण्यापूर्वी जग लहान ओढाच म्हणते. पण नदीला मिळाल्यावर तो नदी होतो. तसा सामान्य साधक सद्‌गुरुकृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्‌गुरुकृपा झाली की तो तत्काळ गुरूच होतो. (१४)
परीस आपणा ऐसें करीना । सुवर्णें लोहो पालटेना ।
उपदेश करी बहुत जना । अंकित सद्गु<रूचा ॥ १५॥
परीस लोखंडाचे सोने करतो पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण जो साधक सद्‌गुरूचा कृपांकित होतो, तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो. (१५)
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णें सुवर्ण करितां न ये ।
म्हणौनी उपमा न साहे । सद्गु्रूसी परिसाची ॥ १६॥
परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही, पण सद्‌गुरुकृपेने शिष्यास मात्र गुरुत्वच प्राप्त होते; म्हणून सद्‌गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्य नाही. (१६)
उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतची क्षार ।
अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७॥
बरे त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो तर अत्यंत खारट असतो म्हणून तीही उपमा योग्य नव्हे. अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पांती क्षीरसागरही नष्ट होतो. म्हणून तीही उपमा देता येत नाही. (१७)
उपमे द्यावा जरी मेरु । तरी तो जड पाषाण कठोरु ।
तैसा नव्हे कीं सद्गु रु । कोमळ दिनाचा ॥ १८॥
सद्‌गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर मेरुपर्वत जड पाषाणाचा व कठोर आणि सद्‌गुरू तर दीन शरणागताविषयी अत्यंत कोमल अंतःकरणाचे असतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. (१८)
उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण ।
या कारणें दृष्टांत हीण । सदद्‌गुरूस गगनाचा ॥ १९॥
बरे ! सद्‌गुरूंना गगनाची उपमा द्यावी, तर त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडचे निर्गुण आहे. म्हणून गगनाची उपमासुद्धा हीन ठरते. (१९)
धीरपणे । म् उपमूं जगती । तरी हेहि खचेल कल्पांतीं ।
म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीण वसुंधरा ॥ २०॥
धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल. म्हणून तिची उपमाही अयोग्य ठरते. (२०)
उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती ।
शास्त्रें मर्यादा बोलती । सद्गुचरु अमर्याद ॥ २१॥
सद्‌गुरू परम प्रकाशरूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहे. पण सद्‌गुरूचे सामर्थ्य अमर्याद आहे. ते नित्य परम प्रकाशरूपच आहेत. (२१)
म्हणौनी उपमे उणा दिनकर । सद्गुfरुज्ञानप्रकाश थोर ।
उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२॥
सदगुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणारा असल्याने त्याला सूर्याची उपमा देताच येत नाही. बरे शेषाची उपमा द्यावी तर त्याने स्वतःच पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे. परंतु श्रीगुरू शिष्याचा संसारभार दूर करतात. म्हणून तीही उपमा देता येत नाही. (२२)
उपमे द्यावें जळ । तरी तें काळांतरीं आटेल सकळ ।
सद्गुसरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३॥
आता जीवनदायी व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी, तर कालांतराने पाणीही आटून जाते. शिवाय ते चंचल असते, पण सद्‌गुरु-स्वरूप निश्चल असून त्याचा नाश कधीच होत नाही. (२३)
सद्गु रूसी उपमावे । म् अमृत । तरी अमर धरिती मृत्यपंथ ।
सद्गुररुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४॥
त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाहीत. पण एकदा सद्‌गुरूची कृपा झाली की, शिष्य मात्र अमर होतो. म्हणून ही उपमाही देता येत नाही. (२४)
सद्गुररूसी म्हणावें कल्पतरु । तरी हा कल्पनेतीत विचारु ।
कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५॥
सद्‌गुरूला कल्पतरूची उपमाही देता येत नाही. कारण तो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेतील पदार्थच देतो. पण सद्‌गुरू कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात. मग कल्पतरूचा अंगीकार कोण करील बरे ! (२५)
चिंता मात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी ।
कामधेनूचीं दुभणीं । निःकामासी न लगती ॥ २६॥
सदगुरूंना चिंतामणीची उपमाही देता येत नाही. कारण ते शिष्याच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाहीत. त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो. मग निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता वा पान्हा यांची आवश्यकताच उरत नाही. म्हणून चिंतामणी वा कामधेनू यांच्याही उपमा सद्‌गुरूना देता येत नाहीत. (२६)
सद्गुीरु म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत ।
ज्याचे द्वारीं असे तिष्टत । मोक्षलक्ष्मी ॥ २७॥
सद्‌गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे, तर तेही योग्य नव्हे कारण लक्ष्मी चंचल असते, नाशिवंत असते, पण सद्‌गुरूंच्या दारी तर साक्षात मोक्षलक्ष्मी त्यांच्या कृपाकटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते. म्हणून ही उपमाही देता येत नाही. (२७)
स्वर्गलोक इंद्र संपती । हे काळांतरीं विटंबती ।
सद्गुतरुकृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८॥
स्वर्गलोक, इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात. पण सद्‌गुरूची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही. (२८)
हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक ।
सर्वदा अविनाश येक । सद्गुवरुपद ॥ २९॥
ब्रह्मा, विष्णू शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात. एक सद्‌गुरुपदच असे आहे की ते अविनाशी आहे. (२९)
तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३०॥
फार काय सांगावे, ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे. फक्त सद्‌गुरूचे स्वरूपच शाश्वत अविनाशी आहे. तेव्हां त्याची उठाठेव करण्यातही काही अर्थ नाही. (३०)
म्हणौनी सद्‌गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना ।
अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१॥
तेव्हा सद्‌गुरूंच्या रूपाचे वर्णन करता येण्यासारखे नाही, हेच माझे वर्णन आहे. जे अंतरीच्या खुणा जाणणारे असतात, त्यांनाच त्यांचे खरे स्वरूप कळते. (३१)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सद्‌गुरुस्तवननाम समास चवथा ॥ ४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘सद्‌गुरुस्तवननाम ‘ समास चौथा समाप्त.

समास पांचवा : संतस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान ।
जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १॥
आता परमार्थाचे जे मुख्य आश्रयस्थान, की ज्यांच्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते, त्या सज्जनांना मी वंदन करतो. (१)
जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ ।
तेंचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २॥
परब्रह्मप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे. पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे. हा अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे संतसंगती. (२)
वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे ।
नाना साधनीं सायासें । न पडे ठाईं ॥ ३॥
परब्रह्म वास्तविक प्रगटच आहे. पण अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही. कारण त्याचा शोध घेऊ गेले असता ते कुठे आढळूनच येत नाही. (३)
जेथें परिक्षवंत ठकले । नांतरी डोळसचि अंध जाले ।
पाहात असताअंचि चुकले । निजवस्तूसी ॥ ४॥
अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात. डोळसांनाही आत्मवस्तु दिसत नाही. तेही चुकतात, म्हणजेच डोळे असूनही आंधळे ठरतात. (४)
हें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना ।
नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५॥
दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तु दिसत नाही. एवढेच नव्हे तर डोळ्यांत नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती दृष्टीपुढे येत नाही. (५)
सोळां कळी पूर्ण शशी । दाखवू शकेना वस्तूसी ।
तीव्र आदित्य कळारासी । तोहि दाखवीना ॥ ६॥
सोळा कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रसुद्धा ती दाखविण्यास समर्थ नाही. एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूस दाखवू शकत नाही. (६)
जया सुर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे ।
नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥ ७॥
कोळ्याच्या अंगांतून बाहेर पडणारा अति सूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो, तसेच अणुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्यप्रकाशाच्या योगे आपण पाहू शकतो. (७)
चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी । परी तो दाखवीना वस्तूसी ।
तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥
एवढेच कशाला, केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते, पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही, पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते. (८)
जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले ।
जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ।
आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की, तेथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात. प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, तर्काने ती जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात. (९)
वळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी ।
जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥
विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो, शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करू जावे तर शब्दांचीच बोबडी वळते व मनाने जाणू जावे, तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही. (१०)
जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष ।
तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥ ११॥
शेषास सहस्त्र मुखे असल्यामुळे वक्त्यांमध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे, पण तोही वर्णन करून थकला, तरी त्याला निजवस्तूचे वर्णन करता आले नाही. (११)
वेदे प्रकाशिलें सर्वही । वेदविरहित कांहीं नाहीं ।
तो वेद कोणासही । दाखवूं सकेना ॥ १२॥
वेदांत सर्व वस्तूंचे वर्णन आढळते. त्यांत ज्या वस्तूचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते; पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तु दाखवू शकत नाही. (१२)
तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे ।
त्याचा महिमा वचनीं सांगे । ऐसा कवणु ॥ १३॥
अशी सर्वप्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तु ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते, त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दांत कसा बरे वर्णन करता येईल ? (१३)
विचित्र कळा ये मायेची । परी वोळखी न संगवे वस्तूची ।
मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४॥
मायेचे अंगी अनेक विचित्र कळा असल्या, तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे. अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल, त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात. (१४)
वस्तूसी वर्णिलें नवचे । तेंचि स्वरूप संतांचें ।
या कारणे वचनाचें । कार्य नाही ॥ १५॥
ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही, त्याप्रमाणेच संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही. कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही. (१५)
संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।
नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६॥
संत हे परमानंदरूप असतात, सुखरूप असतात. एवढेच नव्हे, तर नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते. (१६)
संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती ।
नांतरी भक्तीची फळश्रुती । ते हे संत ॥ १७॥
संत हे विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात. (१७)
संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचें सत्पात्र ।
नांतरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥ १८॥
संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्पात्र असतात; अथवा जेथे पुण्यच उदयास येते, अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय. (१८)
संत समाधीचें मंदिर । संत विवेकाचें भांडार ।
नांतरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥ १९॥
संत म्हणजे समाधीचे मंदिरच, विवेकाचे भांडारच आणि सायुज्य मुक्तीचे माहेरघरच असतात. (१९)
संत सत्याचा निश्चयो । संत सार्थकाचा जयो ।
संतप्राप्तीचा समयो । सिद्धरूप ॥ २०॥
संत सत्याचा कधीही त्याग करीत नाहीत. संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो ज्यावेळी आत्मवस्तुप्राप्तीची वेळ येते, त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते. (२०)
मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत ।
जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१॥
संतांजवळ मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असते. या शाश्वत संपत्तीने ते वैभवसंपन्न असतात. एवढेच नव्हे, तर असंख्य दरिद्री जीवांना मोक्षलक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभवसंपन्न करून सोडतात. (२१)
जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दानशूर ।
तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२॥
संत अत्यंत सामर्थ्यसंपन्न व उदारवृत्तीचे असतात. ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील ? (२२)
माहांराजे चक्रवर्ती । जाले आहेत पुढें होती ।
परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३॥
जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत. सध्या आहेत व पुढेही होतील, पण त्यातील कोणीही सायुज्यमुक्ती देऊ शकत नाहीत. (२३)
जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन ।
तयां संतांचें महिमान । काय म्हणौनी वर्णावें ॥ २४॥
हे सायुज्यमुक्तीचे दान त्रैलोक्यात संतसज्जनांशिवाय कुणी देऊच शकत नाही. ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी ? (२४)
जें त्रैलोक्याहून वेगळें । जें वेदश्रुतीसी नाकळे ।
तेंचि जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥ २५॥
जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहे, जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही, असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकाच्या अंतःकरणात प्रगट होते. (२५)
ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा ।
जयांचेनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६॥
असा हा संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या, तरी त्या अपुर्‍याच पडतात. संतांच्या मुळेच मुख्य परमात्मा प्रगट होतो. (२६)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
संतस्तवननाम समास पांचवा ॥ ५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘संतस्तवननाम’ समास पाचवा समाप्त.

समास सहावा : श्रोतेजनस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन ।
विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १॥
येथे जे श्रोतेजन बसले आहेत त्यांना मी वंदन करतो. भक्त, ज्ञानी, संतसज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत. (१)
येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर ।
येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नांचे ॥ २॥
यांतील काही सत्त्वगुणांचा समुद्रच आहेत, तर कुणी बुद्धिमान आहेत. काही श्रोते नाना शब्दरत्‍नांची जणू खाणच आहेत. (२)
जे नाना अर्थांबृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते ।
नाना संशयातें छेदिते । निश्चै पुरुष ॥ ३॥
कुणी असे रसिक आहेत, की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद ते घेतात. तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात. काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात. (३)
ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार ।
नांतरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४॥
काहींची धारणाशक्ती अशी अपार आहे की,हे ईश्वराचेच अवतार आहेत. ते जेव्हां सभेत बसतात तेव्हा जणूं प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपाने सभेत उपस्थित आहेत, असे वाटते. (४)
किं हे ऋषेश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागळी ।
जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५॥
असे अत्यंत सात्त्विक व मूर्तिमंत शांतिस्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की, जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत शोभा आली आहे. (५)
हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे ।
साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६॥
वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात, त्यांच्या जिव्हेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य, नाट्यादी साहित्यप्रकारांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरू बृहस्पतीच बोलत आहेत. (६)
जे पवित्रपणें वैश्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर ।
ज्ञातेपणें दृष्टीसमोरे । ब्रह्मांड न ये ॥ ७॥
काही श्रोते अग्नीप्रमाणे पवित्र आहेत, तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्फुर्तिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत. काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही. (७)
जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान ।
सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८॥
काही अखंड सावधान आहेत, तर काही त्रिकाळज्ञानी आहेत, तर काही आत्मज्ञानी असून सर्वकाळ निरभिमानी आहेत. (८)
ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐंसें कांहींच नाहीं उरलें ।
पदार्थमात्रांसी लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९॥
ज्यांच्या दृष्टीखालून गेली नाही अशी वस्तूच जगात नाही, असे काही सर्वज्ञ आहेत. त्यांच्या मनाने पदार्थमात्रांस जाणून घेतलेले असते. (९)
जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वीच ठावें ।
तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १०॥
बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे, ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते. तेव्हां शहाणपणाचा आव आणून त्यांच्यासमोर बोलावे तरी काय, हेच कळत नाही. (१०)
परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक ।
भाग्यपुरुष काये येक । सेवीत नाहीं ॥ ११॥
परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात. ते जे समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात. म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे. (११)
सदा सेविती दिव्यान्नें । पालटाकारणें आवेट अन्नें ।
तैसींच माझीं वचनें । पराकृतें ॥ १२॥
जे सर्वदा दिव्यान्‍ने सेवन करतात, तेही रुचिपालटाकरिता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात, तशीच ते माझी प्राकृत वचने गोड मानून घेतील. (१२)
आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्वर ।
परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३॥
प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वरपूजन करावे असे सांगितले जाते, पण परमेश्वरपूजनच करू नये, हा विचार कुठेही सांगितलेला नाही. (१३)
तैसा मी येक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ ।
यांची पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४॥
त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वरस्वरूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो, तरी मला जमेल तशा ओबडधोबड शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे. (१४)
वित्पत्ती नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं ।
भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौल्यता नाहीं वचनाची ॥ १५॥
माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती, ज्ञान, वैराग्यादी गुण नाहीत, तसेच शब्दमाधुर्यही नाही. (१५)
ऐसा माझा वाग्विाळास । म्हणौन बोलतों सावकाश ।
भावाचा भोक्ता जगदीश । म्हणौनियां ॥ १६॥
माझा वाग्विलास हा असा आहे, पण जगदीश हा भावाचा भोक्ता असतो. हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेस प्रवृत्त झालो आहे. (१६)
तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथें माझी वित्पत्ती किती ।
बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ॥ १७॥
आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीच आहात. माझी व्युत्पत्ती ती किती ? मी मंदबुद्धीचा, मूळ असा आहे आणि तरी आपल्याशी सलगी करीत आहे. (१७)
समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याचा आंगीं ।
तुम्हां संतांचा सलगी । म्हणौनि करितों ॥ १८॥
एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला, तरी तो बापाची सलगी करू शकतो. तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे. (१८)
व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयाचकित लोक ।
परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढे खेळती ॥ १९॥
व्याघ्र-सिंहादी हिंस्त्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात. पण त्यांची पिल्ले निःशंक मनाने त्यांच्यापुढे खेळत असतात. (१९)
तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतांपासीं बोलत ।
तरी माझी चिंता तुमचे चित्त । वाहेलच कीं ॥ २०॥
त्याप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हांपाशी बोलत आहे. तुम्ही माझी निश्चितच काळजी वाहाल अशी मला खात्री आहे. (२०)
आपलेंची बोले वाउगें । त्याची संपादणी करणें लागे ।
परंतु काहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१॥
आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले, तर आईबापांना त्यास सांभाळून घ्यावेच लागते. सांभाळून घ्या अशी विनवणी त्यांना करावी लागत नाही. (२१)
हें तों प्रीतीचें लक्षण । स्वभावेंची करी मन ।
तैसे तुम्ही संतसज्जन । मायेबाप विश्वाचे ॥ २२॥
ते सांभाळून घेतात हे तर प्रेमाचे लक्षणच असते. ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात. तसेच तुम्ही संतसज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात. (२२)
माझा आशय जाणोनी जीवें । आतां उचित तें करावें ।
पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३॥
म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे, अशी आपल्या दासांचाही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे. (२३)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रोतेस्तवननाम समास सहावा ॥ ६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘श्रोतेजनस्तवननाम’ समास सहावा समाप्त.

समास सातवा : कवेश्वरस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।
नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥
आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो. ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दांच्या साहाय्याने नवी सृष्टीच उत्पन करतात किंवा कवी म्हणजे जणू वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय. (१)
कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन ।
नाना शब्दांचें भुवन । येथार्थ होये ॥ २॥
कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय. नाना कलांचा विकास कवींच्यामुळेच होतो. अनेक शब्दांचे घर म्हणजे कवी, असे म्हटले तरी ते योग्य ठरेल. (२)
कीं हे पुरुषार्थाचें वैभव । कीं हे जगदीश्वराचें महत्व ।
नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३॥
जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्त्व वाढविण्याचे कार्य नाना युक्त्या योजून, संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात. (३)
कीं हे शब्दरत्नाचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्त सरोवर ।
नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण जाले ॥ ४॥
कवी हे शब्दरत्‍नांचे सागर असतात. मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात. बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्तिस्थान कवीच असतात. या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखविण्यासाठीच जणू ते जन्मास येतात. (४)
अध्यात्मग्रंथांची खाणी । कीं हे बोलिके चिंतामणी ।
नाना कामधेनूचीं दुभणीं । वोळलीं श्रोतयांसी ॥ ५॥
कवी हे अध्यात्मग्रंथांची खाण असतात, चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते; पण तो अचेतन असतो. कवीही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्‍नांच्या साहाय्याने करून देतात. ते चेतन असतात, म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेतनूंनी स्रवलेल्या अमृतधारा असे समजावे. (५)
कीं हे कल्पनेचे कल्पतरु । कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु ।
नाना सायोज्यतेचे विस्तारु । विस्तारले ॥ ६॥
किंवा कवी म्हणजे कल्पिलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावाडीच आहेत किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहेत. (६)
कीं हा परलोकींचा निजस्वार्थु । कीं हा योगियांचा गुप्त पंथु ।
नाना ज्ञानियांचा परमार्थु । रूपासि आला ॥ ७॥
किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योगमार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रगट झाला आहे. (७)
कीं हे निरंजनाची खूण । कीं हे निर्गुणाची वोळखण ।
मायाविलक्षणाचे लक्षण । ते हे कवी ॥ ८॥
निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतलेच असते. कारण जेथे इंद्रिये, मन, बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दांत कशी वर्णन करणार ? पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात. (८)
कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ ।
नातरी होये सुल्लभ । निजबोध कविरूपें ॥ ९॥
कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या साहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोधरूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवींची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे. (९)
कवि मुमुक्षाचें अंजन । कवि साधकांचें साधन ।
कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १०॥
कवी हे मुमुक्षूंना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधनरूपच आहेत किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी. (१०)
कवि स्वधर्माचा आश्रयो । कवि मनाचा मनोजयो ।
कवि धार्मिकाचा विनयो । विनयकर्ते ॥ ११॥
कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे, तर मनोजय कसा करावा यांचेही मार्गदर्शन ते करतात म्हणून त्यांनाच येथे मनोजय म्हटले आहे; तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो, तोही एकप्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो म्हणून त्यांना येथे विनयकर्ते असे समर्थ म्हणत आहेत. (११)
कवि वैराग्याचें संरक्षण । कवि भक्तांचें भूषण ।
नाना स्वधर्मरक्षण । ते हे कवी ॥ १२॥
कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात म्हणजे याप्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवितात म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे. कवींमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात. म्हणून त्यांना स्वधर्मसंरक्षण असे म्हटले आहे. (१२)
कवि प्रेमळांची प्रेमळ स्थिती । कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ति ।
कवि उपासकांची वाड कीर्ती । विस्तारली ॥ १३॥
प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात, तर ध्यान कसे करावे यांचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्ट देवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास साहाय्य करतात. भक्तांची, उपासकांची श्रेष्ठ कीर्तीही कवींच्यामुळेच सर्वदूर पसरते. (१३)
नाना साधनांचे मूळ । कवि नाना प्रेत्नांचें फळ ।
नाना कार्यसिद्धि केवळ । कविचेनि प्रसादें ॥ १४॥
कवींच्यामुळेच लोकांना नाना साधनांची माहिती मिळते, काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते हे कळते, एवढेच नव्हे, तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यांत सिद्धी प्राप्त होते. (१४)
आधीं कवीचा वाग्विळास । तरी मग श्रवणीं तुंबळे रस ।
कविचेनि मतिप्रकाश । कवित्वास होये ॥ १५॥
कवींचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो, तर त्यांच्या श्रेष्ठप्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. (१५)
कवि वित्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंतांची सत्ता ।
कवि विचक्षणाची कुशळता । नाना प्रकारें ॥ १६॥
कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते, तर हुषार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. (१६)
कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना धाटी मुद्रा छंद ।
कवि गद्यपद्यें भेदाभेद । पदत्रासकर्ते ॥ १७॥
कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार धाटी, मुद्रा, छंद, प्रास उपयोगात आणतात, गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात. कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात. (१७)
कवि सृष्टीचा आळंकार । कवि लक्ष्मीचा शृंघार ।
सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवी ॥ १८॥
या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात, त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात; कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच होत आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धारही कवीश्वरच असतात. (१८)
कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण ।
नान सुखाचें संरक्षण । ते हे कवी ॥ १९॥
कवींमुळे सभा शोभून दिसते. ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षणरूपच असतात. (१९)
कवि देवांचे रूपकर्ते । कवि ऋषीचें महत्ववर्णिते ।
नाना शास्त्रांचें सामर्थ्य ते । कवि वाखाणिती ॥ २०॥
कवींमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्त्व वाढवितात व कवींमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात. (२०)
नस्ता कवीचा व्यापार । तरी कैंचा अस्ता जगोद्धार ।
म्हणौनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१॥
कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती, तर जगाचा उद्धार कसा बरे झाला असता ? म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहेत. (२१)
नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवेश्वरेंविण तों नाहीं ।
कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२॥
कवी नसते तर चौदा विद्या, विविध प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार व प्रसार कसा झाला असता ? म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञानप्रसारास कवीच कारणीभूत आहेत. (२२)
मागां वाल्मीक व्यासादिक । जाले कवेश्वर अनेक ।
तयांपासून विवेक । सकळ जनासी ॥ २३॥
पूर्वी वाल्मीकी, व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. (२३)
पूर्वीं काव्यें होतीं केलीं । तरीच वित्पत्ती प्राप्त झाली ।
तेणे पंडिताआंगीं बाणली । परम योग्यता ॥ २४॥
त्यांच्यासारख्यांनी केलेली उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परम योग्यता प्राप्त झाली. (२४)
ऐसे पूर्वीं थोर थोर । जाले कवेश्वर अपार ।
आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५॥
असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो. (२५)
नाना चातुर्याच्या मूर्ती । किं हे साक्षात् बृहस्पती ।
वेद श्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६॥
हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच होय. अथवा वेद व श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात, असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. (२६)
परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें ॥
सेखीं बोलीले पूर्णपणें । संशयातीत ॥ २७॥
केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धान्त विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यांतून सांगतात. (२७)
कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसाचे वोघ लोटले ।
नाना सुखाचे उचंबळले । सरोवर हे ॥ २८॥
हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहेत. किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाहच आहेत किंवा नाना प्रकारच्या सुखांनी उचंबळून येणारी ही सरोवरे आहेत. (२८)
कीं हे विवेकनिधीचीं भांडारें । प्रगट जालीं मनुष्याकारें ।
नाना वस्तूचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९॥
कवींचे अंतरंग निरनिरळ्या वस्तूंच्या विचाराने भरले असते. म्हणून त्यांना मनुष्यरूपांनी प्रगटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ म्हणतात. (२९)
कीं हे आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदार्थास आणी उणें ।
लाधलें पूर्व संचिताच्या गुणें । विश्वजनासी ॥ ३०॥
किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून, जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरविणारी ही ठेव, लोकांना त्यांच्या पूर्वपुण्यसंचयानेच प्राप्त झालेली असते. (३०)
कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदे उतटलीं ।
विश्वजनास उपेगा आलीं । नाना प्रयोगाकारणे ॥ ३१॥
कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची ‘जहाजेच’ असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगांसाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत. (३१)
कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती ।
नांतरी भक्तीची फळश्रुती । फळास आली ॥ ३२॥
कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगस्थितीच आहे किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आली आहे. (३२)
कीं हा ईश्वराचा पवाड । पाहातां गगनाहून वाड ।
ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंदरचना ॥ ३३॥
किंवा आकाशाहूनही विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे. किंवा या विशाल ब्रह्मांडरचनेहूनही थोर अशी कवींची प्रबंधरचना आहे. (३३)
आतां असो हा विचार । जगास आधार कवेश्वर ।
तयांसी माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४॥
असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत, म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवितो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. (३४)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कवेश्वरस्तवननाम समास सातवा ॥ ७॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘कवेश्वरस्तवननाम’ समास सातवा समाप्त

समास आठवा : सभास्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदूं सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा ।
जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठतु भरें ॥ १॥
श्री समर्थ म्हणतात की, आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो, जेथे मुक्ती अत्यंत सुलभ असते व जेथे स्वतः जगदीश प्रेमभराने तिष्ठत उभा असतो. (१)
श्लोक ॥ नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्‌भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥
नाहीं वैकुंठीचा ठाईं । नाहीं योगियांचा हृदईं ।
माझे भक्त गाती ठाईं ठाईं । तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ २॥
भगवान म्हणतात की, ‘नारदा, मी वैकुंठात, योग्यांच्या हृदयात (अथवा सूर्यबिंबामध्ये) राहात नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी कीर्ती गातात, तेथे मी उभा असतो. (२)
याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ ।
नामघोषें घडघडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३॥
असे स्वतः भगवंतांनी सांगितले असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून जयजयकार करून त्याची कीर्ती गात असतात, ती सभा श्रेष्ठ असून ती म्हणजेच खरे वैकुंठ होय. (३)
प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें ।
वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४॥
अशा सभेमध्ये प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत्-कथा, हरिकीर्तन, वेदांवरील व्याख्यान, तसेच पुराण-श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर चालू असतात. (४)
परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणाचे संवाद ।
अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथे ॥ ५॥
तेथे परमेश्वराचे गुणानुवाद गायले जातात. विविध विषयांवर सुंदर निरूपण केले जाते. तसेच अध्यात्मविद्येतील अनेक भेदांवर चर्चा केली जाते. (५)
नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकानिवृत्ती ।
चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विळासें ॥ ६॥
अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका-कुशंका तसेच तर्क-कुतर्कांचे समाधानकारक निरसन केले जाते. त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते. अशाप्रकारे व्याख्यान- प्रवचनादिकांमुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इष्टदैवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते. (६)
भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्त्विक ।
रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७॥
अशा सभेत प्रेमळ भाविक भक्त, गंभीर वृत्तीचे सभ्य सात्त्विक लोक, तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित येतात. (७)
कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ ।
सुचिस्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८॥
या सभेत कर्मनिष्ठ आचारनिष्ठ, दानशील धर्मनिष्ठ, पवित्र आचरणाचे पुण्यशील व ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे व जे कृपाळू आहेत असे लोक संमिलित होतात. (८)
योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस ।
विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९॥
दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी ।
येक बाळब्रह्मचारी । योगेश्वर ॥ १०॥
तेथे योगी, वैराग्ययुक्त, उदासीन, नियमनिष्ठ निग्रही, तापसी, विरक्त, निःस्पृह बराच काळ अरण्यात राहाणारे दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे वैष्णव, तर कुणी बालब्रह्मचारी वा योगी असे नाना प्रकारचे लोक येतात. (९-१०)
पुरश्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी ।
माहायोगी आणी जनस्वी । जनासारिखे ॥ ११॥
कुणी पुरश्चरण करणारे तर कुणी तपस्वी, कुणी तीर्थक्षेत्रात राहाणारे, तर कुणी मनाचा निग्रह करणारे, कुणी महायोगी तर जनात राहून जनांवर स्वामित्व गाजविणारे, लोकांचे श्रद्धास्थान असणारे असतात. (११)
सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक ।
येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२॥
सिद्ध, साधू, साधक, मंत्र-यंत्र करून देणारे कुणी एकनिष्ठ उपासक, तर कुणी गुणग्राही असतात. (१२)
संत सज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन ।
प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते ॥ १३॥
येथे संत, सजन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, ज्ञानी, सर्वज्ञ, तर कुणी शुद्ध समाधान करणारे असतात. (१३)
योगी वित्पन्न ऋषेश्वर । धूर्त तार्किक कवेश्वर ।
मनोजयाचे मुनेश्वर । आणी दिग्वल्की ॥ १४॥
योगी, विद्वान, ऋषीश्वर तर कुणी धूर्त, तार्किक, कवीश्वर मनोनिग्रही मुनिश्रेष्ठ, तर काही दिगंबरही असतात. (१४)
ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी । तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी ।
योगाभ्यासी योगज्ञानी । उदासीन ॥ १५॥
ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्त्वज्ञानी, पिंडज्ञानी योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन असे नाना प्रकारचे लोक असतात. (१५)
पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक ।
भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६॥
कुणी पंडित तर कुणी पुराणिक तर कुणी विद्वान तर कुणी वैदिक, भट पाठक, यजुर्वेदी इत्यादी नाना लोक एकत्र येतात. (१६)
माहाभले माहाश्रोत्री । याज्ञिक आणी आग्नहोत्री ।
वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७॥
अती चांगले, महाश्रोत्री, याज्ञिक, अग्निहोत्री, वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकही असतात. (१७)
भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान ।
बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥ १८॥
काही भूत, भविष्य, वर्तमानकाळाचे ज्ञान असणारे त्रिकाल असतात, तर काही बहुश्रुत काही निरभिमानी व काही अगदी निरपेक्ष असतात. (१८)
शांति क्ष्मा दयासीळ । पवित्र आणी सत्वसीळ ।
अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्वरी पुरुष ॥ १९॥
शांती, क्षमा, दयाशील पवित्र, सत्त्वशील, शुद्ध अंतःकरणाचे, ज्ञाननिष्ठ जणू ईश्वरी अवतार असेही काही असतात. (१९)
ऐसे जे कां सभानायेक । जेथें नित्यानित्यविवेक ।
त्यांचा महिमा अलोलिक । काय म्हणोनि वर्णावा ॥ २०॥
अशा प्रकारचे जे सभानायक असतात, जेथे नित्यानित्य विवेक असतो, त्यांचा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल ? (२०)
जेथें श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये ।
तेथें जनासी तरणोपाये । सहजचि होये ॥ २१॥
जेथे असा परमार्थसमुदाय असतो त्या सभेत श्रवणाचा लाभ घडला, तर सामान्य लोकांनाही भवसागर तरून जाण्याचा उपाय अगदी सहज प्राप्त होतो. (२१)
उत्तम गुणाची मंडळी । सत्वधीर सत्वागळी ।
नित्य सुखाची नव्हाळी । जेथें वसे ॥ २२॥
अशा सभेत सर्व उत्तम गुणांची मंडळी, सत्त्वशील, सत्त्वनिष्ठ एकत्र जमतात, त्यामुळे तेथे नित्य सुखप्राप्तीच होते. (२२)
विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सत्पात्रें ।
भगवंताचीं प्रीतिपात्रें । मिळालीं जेथें ॥ २३॥
तेथे विद्यासंपन्न, कलासंपन्न, विशेष गुणसंपन्न व भगवंतास अत्यंत प्रिय असणारे लोक एकत्रित येतात. (२३)
प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी ।
गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४॥
प्रवृत्त, निवृत्त, प्रपंची, परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थी आणि संन्यासी तेथे असतात. (२४)
वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ ।
अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामीं ॥ २५॥
तेथे वृद्ध, तरुण, बाल, स्त्रिया, पुरुष आदी सर्वच श्याम-वर्ण भगवान विष्णूचे हृदयात अखंड ध्यान करतात. (२५)
ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन ।
जयांचेनि समाधान । अकस्मात बाणें ॥ २६॥
असे जे परमेश्वराला प्रिय असणारे लोक आहेत, त्यांना मी अभिवंदन करतो. त्यांच्या सहवासाने तत्काळ समाधान मिळून ते स्थिर होते. (२६)
ऐंसिये सभेचा गजर । तेथें माझा नमस्कार ।
जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७॥
जेथे नित्य निरंतर भगवंताच्या कीर्तनाचा गजर होत असतो, अशा सभेस माझा नमस्कार असो. (२७)
जेथें भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती ।
ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं । महंत बोलिले ॥ २८॥
जेथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्तिस्वरूप सत्पुरुष असतात, तेथे गेले असता सहजच उत्तम गती प्राप्त होते, असे अनेक संत-महंतांनी अनेक ग्रंथांतून ठामपणे सांगितले आहे. (२८)
कल्लौ कीर्तन वरिष्ठ । जेथें होय ते सभा श्रेष्ठ ।
कथाश्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९॥
कलियुगात हरिकीर्तन हेच सर्वोत्कृष्ट साधन असून जेथे हरिकीर्तन होते, तीच सभा श्रेष्ठ होय. तेथील श्रवणाने नाना प्रकारचे वाईट संदेह नाहीसे होतात. (२९)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सभास्तवननाम समास आठवा ॥ ८॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे
‘सभास्तवननाम’ समास आठवा समाप्त.

समास नववा : परमार्थस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां स्तऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ ।
नांतरी समर्थामध्ये समर्थ । योग हा ॥ १॥
आता परमार्थाचे गुणवर्णन करून सांगतो. कारण परमार्थ हेच साधकांचे मुख्य ध्येय असून मानवी जीवनात सर्वोत्तम समर्थ योग परमार्थच आहे. (१)
आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम ।
कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २॥
खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संत-समागम केला तर त्याची सहज प्राप्ती होते; पण लोकांना हे मर्म कळत नाही. त्यामुळे त्यांना तो अति दुर्गम वाटतो. (२)
नाना साधनांचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार ।
वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३॥
परब्रह्मप्राप्तीची अनेक साधने आहेत, पण त्यांचे फल कालांतराने मिळते; पण संतसमागम हा रोकडा व्यवहार आहे. म्हणजे त्याने ब्रह्मसाक्षात्कार हे फळ तत्काळ मिळते. वेदशास्त्रांचे जे सार तो ब्रह्मसाक्षात्कार तत्काळ अनुभवास येतो. (३)
आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे ।
उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥ ४॥
तसे पाहिले तर परमार्थ म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून राहिले आहे, पण पाहावयास गेले तर अणुमात्रही दृष्टीस पडत नाही. सर्वसंगपरित्याग करून एकांतात राहून प्रयत्न केला तरी ते दिसत नाही. (४)
आकाशमार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ ।
इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५॥
जे योगी असतात, तेच सुषुम्ना नाडीद्वारे षट्चक्रे भेदून हृदयाकाशमार्गाने गुप्तपणे स्वस्वरूपदर्शन करू शकतात. त्यांच्या ठिकाणीच या मार्गाचे ज्ञान व तो आक्रमण्याची क्षमता असते. सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही. (५)
साराचेंहि निजसार । अखंड अक्षै अपार ।
नेऊं न सकती तश्कर । कांही केल्या ॥ ६॥
परमार्थ हा सर्व साराचेही निजसार असून तो अखंड, अक्षय व अपार असा परब्रह्मस्वरूपच असतो. त्यास कुणी चोरू शकत नाही. (६)
तयास नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये ।
अथवास्वापदभये । बोलोंच नये ॥ ७॥
त्यास राजभय नाही, अग्निभय नाही अथवा श्वापदभय नाही. असल्या भयाची गोष्टच कुणी बोलू नये. (७)
परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावही चुकेना ।
काळांतरी चळेना । जेथीचा तेथें ॥ ८॥
परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही, तसेच दुसरे कुणीही त्याला हलवू शकत नाही, कितीही काळ गेला तरी ते आपले स्थान सोडत नाही. जिथल्या तिथे स्थिर असते. (८)
ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे ।
अथवा नव्हे आदिक उणें । बहुतां काळें ॥ ९॥
अशी ती अगदी स्वतःची खास ठेव आहे. त्यात कधीही परिवर्तन होत नाही, अथवा कितीही काळ लोटला तरी त्यात अधिक-उणे होत नाही. (९)
अथवा तें घसवटेना । अथवा अदृश्य होयेना ।
नांतरी पाहातां दिसेना । गुरु‍अंजनेविण ॥ १०॥
त्याचप्रमाणे ते झिजतही नाही वा अदृश्यही होत नाही. पण असे असून गुरुकृपेच्या अंजनाशिवाय पाहू गेले तर ते दिसतही नाही. (१०)
मागां योगिये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ ।
यासि बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥ ११॥
पूर्वीही जे सामर्थ्यसंपन्न योगी होऊन गेले, त्यांचाही निजस्वार्थ परमार्थ हाच होता. परमार्थ परम गुप्त असतो, म्हणूनच त्यास परमार्थ म्हणतात. (११)
जेंही शोधून पाहिला । त्यासी अर्थ सांपडला ।
येरां असोनी अलभ्य जाला । जन्मोजन्मीं ॥ १२॥
ज्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याची प्राप्ती झाली. जे असा प्रयत्नच करीत नाहीत त्यांना तो जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी त्याची प्राप्ती होत नाही. (१२)
अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्याची ।
आणी पदवी सायोज्यतेची । सन्निधचि लाभें ॥ १३॥
हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्ममृत्यूची वार्ताही नसते. उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते. (१३)
माया विवेकें मावळे । सारासारविचार कळे ।
परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४॥
सारासार विवेकामुळे मायेचे पटल नाहीसे होते व अंतर्यामी परब्रह्माचा साक्षात्कार होतो. (१४)
ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड ।
पंचभूतांचें थोतांड । तुछ्य वाटे ॥ १५॥
सर्वत्र ते ब्रह्मच व्यापून आहे अशी अनुभूती येऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते. आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो. (१५)
प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका ।
शुद्ध आत्मा विवेका- । अंतरीं आला ॥ १६॥
प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते व विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रगट होते. (१६)
ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरीं ।
दृश्याची जुनी जर्जरी । कुहिट जाली ॥ १७॥
अंतरंगात स्वस्वरूपानुभव आला म्हणजे संशय कुठल्याकुठे नाहीसा होतो. हे सर्व दृश्य विश्व जुनाट फाटलेले, विटलेले वाटू लागते. (१७)
ऐसा हा परमार्थ । जो करी त्याचा निजस्वार्थ ।
आतां या समर्थास समर्थ । किती म्हणौनि म्हणावें ॥ १८॥
परमार्थ हा असा आहे. जो करील त्याच्या जन्माचे सार्थक होते. हा इतका श्रेष्ठ, थोर व उत्तमोत्तम आहे की, याची प्रशंसा तरी किती करावी ? (१८)
या परमार्थाकरितां । ब्रह्मादिकांसि विश्रामता ।
योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९॥
या परमार्थामुळेच ब्रह्मादी देवांना विश्रांती लाभते. त्याच्या योगानेच योगी परब्रह्माशी तादात्म्याचा अनुभव घेतात. (१९)
परमार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु माहानुभावां ।
सेखीं सात्विक जड जीवां । सत्संगेंकरूनी ॥ २०॥
सिद्ध, साधू, महानुभाव इत्यादी सर्वांना परमार्थामुळेच विसावा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर सामान्य जड पण सात्त्विक जीवांनाही संतसंगतीने हा लाभ मिळू शकतो. (२०)
परमार्थ जन्माचें सार्थक । परमार्थ संसारीं तारक ।
परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकासी ॥ २१॥
परमार्थामुळेच मनुष्यजन्माचे सार्थक होते. जीव परमार्थामुळेच संसारातून तरून जातो. धार्मिकांना परमार्थामुळेच परलोकात उत्तम गती प्राप्त होते. (२१)
परमार्थ तापसांसी थार । परमार्थ साधकांसी आधार ।
परमार्थ दाखवी पार । भवसागराचा ॥ २२॥
तपस्वी लोकांचा परमार्थच आश्रयदाता आहे. साधकांना परमार्थच आधार असून त्याच्या योगेच या भवसागरातून पैलतीरास जाता येते. (२२)
परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी ।
या परमार्थाची सरी । कोणास द्यावी ॥ २३॥
जो परमार्थ करतो तोच खरा श्रीमंत होय व जो परमार्थ करीत नाही तोच खरा भिकारी ! अशा या परमार्थाची तुलना तरी कुणाबरोबर करावी ? (२३)
अनंत जन्मींचें पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे ।
मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ २४॥
अनंत जन्मांची पुण्याई गाठी असेल तरच मनुष्याकडून परमार्थ घडतो. परमार्थामुळे आपल्या अंतरातच आपणास मुख्य परमात्मा अनुभवास येतो. (२४)
जेणें परमार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थक केला ।
येर तो पापी जन्मला । कुलक्षयाकारणें ॥ २५॥
ज्याने कुणी परमार्थाचे हे श्रेष्ठत्व जाणले असेल त्याचाच जन्म खरोखरी सार्थकी लागतो. इतर जे त्याचे महत्त्व जाणत नाहीत, ते लोक पापी असून केवळ कुलक्षयाकरिताच जन्मास येतात. (२५)
असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा सीण ।
त्य मूर्खाचें मुखावलोकन । करूंच नये ॥ २६॥
असो. भगवत्प्राप्तीसाठी प्रयत्न न करता जो केवळ संसारासाठी कष्ट उपसतो, अशा मूर्ख माणसाचे तोंडही पाहू नये. (२६)
भल्यानें परमार्थीं भरावें । शरीर सार्थक करावें ।
पूर्वजांस उद्धरावें । हरिभक्ती करूनी ॥ २७॥
चांगल्या माणसाने हा मनुष्यदेह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्याने भगवद्‌भक्ती करून स्वतःचा व पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा. (२७)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
परमार्थस्तवननाम समास नववा ॥ ९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘परमार्थस्तवननाम’ समास नववा समाप्त.

समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण

॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ।
जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १॥
खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य आहे. कारण याची अपूर्वता अशी आहे की, या देहात परमार्थाचा जो जो छंद लागेल तो तो सिद्धीस जातो. (१)
या नरदेहाचेनि लागवेगें । येक लागले भक्तिसंगें ।
येकीं परम वीतरागें । गिरिकंदरें सेविलीं ॥ २॥
या नरदेहाच्या योगे कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगरकपारीत एकांतात जाऊन राहातात. (२)
येक फिरती तिर्थाटणें । येक करिती पुरश्चरणें ।
येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३॥
कुणी तीर्थयात्रा करतात, तर कुणी पुरश्चरणे करतात. काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात. (३)
येक तपें करूं लागले । येक योगाभ्यासी माहाभले ।
येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्री वित्पन्न ॥ ४॥
कुणी तपाचरण करतात, तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात. कुणी अभ्यास करून वेदशास्त्रांत पारंगत होतात. (४)
येकीं हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला ।
येकीं देह ठाईं पाडिला । भावार्थबळें ॥ ५॥
कुणी हठयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात, तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागीच देवाचा साक्षात्कार करून घेतात. (५)
येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात ।
येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥ ६॥
कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात, तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळवितात. कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात. (६)
येक तेजीं तेजचि जाले । येक जळीं मिळोन गेले ।
येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरूपीं ॥ ७॥
कुणी तेजोरूप होऊन तेजात विलीन होतात, तर कुणी जळात विरघळून जातात. कुणी पवनजय करून वायुरूप होऊन एकाएकी अदृश्य होतात. (७)
येक येकचि बहुधा होती । येक देखतचि निघोनि जाती ।
येक बैसले असतांची भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८॥
कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात, तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात. कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी, समुद्रादी ठिकाणीही फिरून येतात. (८)
येक भयानकावरी बैसती । एक अचेतनें चालविती ।
येक प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी ॥ ९॥
कुणी व्याघ्रादी हिंस्त्र पशूवर स्वार होतात, तर कुणी जड भिंती इत्यादीही चालवितात. कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसासही जिवंत करतात. (९)
येक तेजें मंद करिती । येक जळें आटविती ।
येक वायो निरोधिती । विश्वजनाचा ॥ १०॥
कुणी तेजाला मंद करतात, तर कुणी जलाशय कोरडे करतात, तर कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. (१०)
ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्धी ।
ऐसे सिद्ध लक्षावधी । हो‍ऊन गेले ॥ ११॥
कोणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवितात. असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत. (११)
येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध । येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध ।
ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध । विख्यात जाले ॥ १२॥
कुणी मनोसिद्ध असतात म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीस जातो, तर कुणी वाचासिद्ध असतात म्हणजे ते जे बोलतात ते तत्काळ खरे होते. कुणी अल्पसिद्ध म्हणजे लहानसहान सिद्धी प्राप्त केलेले असतात, तर कुणी सर्वसिद्ध म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले असतात. असे नाना प्रकारचे सिद्धपुरुष कीर्ती मिळवून गेले आहेत. (१२)
येक नवविधाभक्तिराजपंथें । गेले, तरले परलोकींच्या निजस्वार्थें ।
येक योगी गुप्तपंथें । ब्रह्मभुवना पावले ॥ १३॥
कुणी नवविधाभक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरून गेले व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी जन्म सार्थकी लावला. कुणी योगी सुषुम्नेच्या गुप्तमार्गाने ब्रह्मलोकास गेले. (१३)
येक वैकुंठास गेले । येक सत्यलोकीं राहिले ।
येक कैळासीं बैसले । शिवरूप हो‍ऊनी ॥ १४॥
कुणी वैकुंठास गेले, कुणी सत्यलोकात राहिले तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले. (१४)
येक इंद्रलोकीं इंद्र जाले । येक पितृलोकीं मिळाले ।
येक ते उडगणी बैसले । येक ते क्षीरसागरी ॥ १५॥
कुणी इंद्रलोकी इंद्र झाले, तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला. कुणी नक्षत्रमंडळात जाऊन बसले, तर कुणी क्षीरसागरात जाऊन राहिले. (१५)
सलोकता समीपता । स्वरूपता सायोज्यता ।
या चत्वार मुक्ती तत्वतां । इच्छा से‍ऊनि राहिले ॥ १६॥
सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या चार मुक्तींपैकी ज्याला ज्या मुक्तीची इच्छा होती, त्याप्रमाणे ती ती मुक्ती त्यांनी मिळविली. (१६)
ऐसे सिद्ध साधू संत । स्वहिता प्रवर्तले अनंत ।
ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणौन वर्णावा ॥ १७॥
याप्रमाणे या नरदेहाच्या साह्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले. सिद्ध, साधू, संत यांची अशी अनंत उदाहरणे आहेत. म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे ? (१७)
या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें ।
मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ १८॥
या नरदेहायोगे नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासारविचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत. (१८)
या नरदेहाचेनि संमंधें । बहुत पावले उत्तम पदें ।
अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ॥ १९॥
या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम पदे मिळविली. देहाची अहंता सोडून स्वस्वरूपानुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झाले (१९)
नरदेहीं ये‍ऊन सकळ । उधरागती पावले केवळ ।
येथें संशयाचें मूळ । खंडोन गेलें ॥ २०॥
या नरदेहात आल्यावर विवेकाच्या साहाय्याने सर्व संशयांचे निरसन झाल्याने अनेकांना सद्‌गतीचा लाभ झाला आहे. (२०)
पशुदेहीं नाहीं गती । ऐसे सर्वत्र बोलती ।
म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१॥
पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात, म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. (२१)
संत महंत ऋषी मुनी । सिद्ध साधू समाधानी ।
भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२॥
तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी ।
शडदर्शनी तापसी । नरदेहींच जाले ॥ २३॥
संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्त्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर संन्यासी, षड्दर्शनी, तापसी यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली. (२२-२३)
म्हणौनी नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ ।
जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचें ॥ २४॥
म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेहच सर्वांत श्रेष्ठ आहे, कारण या देहातच यमयातनारूपी अरिष्ट चुकविण्याची संधी प्राप्त होते. (२४)
नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन ।
परंतु हा परोपकारीं झिजऊन । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५॥
नरदेह सहसा पराधीन असत नाही, स्वाधीनच असतो. म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्तिरूपे उरवावा. (२५)
अश्व वृषभ गाई म्हैसी । नाना पशु स्त्रिया दासी ।
कृपाळूपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील ॥ २६॥
घोडा, बैल, गाई, म्हशी, इतर नाना पशू व स्त्रिया, विशेषतः दासी यांना जर कृपाळूपणे मोकळे सोडले, तर त्यांना कुणीही धरून नेईल. (२६)
तैसा नव्हे नरदेहो । इछा जाव अथवा रहो ।
परी यास कोणी पाहो । बंधन करूं सकेना ॥ २७॥
पण पुरुषदेहाची स्थिती तशी नाही. त्याची इच्छा असेल, तर त्याने घरात राहावे वा बाहेर जावे, पण त्याला कुणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही. (२७)
नरदेह पांगुळ असता । तरी तो कार्यास न येता ।
अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये ॥ २८॥
नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही. अथवा तो थोटा असेल तरी त्याने परोपकार करता येत नाही. (२८)
नरदेह अंध असिला । तरी तो निपटचि वायां गेला ।
अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९॥
नरदेह आंधळा असेल तर तो पूर्णपणे वायाच जातो. अथवा बहिरा असेल तर श्रवण-निरूपणाच्या उपयोगी पडत नाही. (२९)
नरदेह असिला मुका । तरी घेतां न ये आशंका ।
अशक्त रोगी नासका । तरी तो निःकारण ॥ ३०॥
नरदेह मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यांचे निरसन होत नाही किंवा तो अशक्त, रोगी, किंवा सडलेला असेल तरी तो कुचकामाचा ठरतो. (३०)
नरदेह असिला मूर्ख । अथवा फेंपया समंधाचें दुःख ।
तरी तो जाणावा निरार्थक । निश्चयेंसीं ॥ ३१॥
नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल अथवा त्याला फेफरे अथवा समंधाची बाधा वगैरे असेल तरी तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा. (३१)
इतकें हें नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग ।
तेणें धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥ ३२॥
इतकी ही व्यंगे नसून चांगला आरोग्यसंपन्‍न, धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थमार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. (३२)
सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्ले ।
तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ॥ ३३॥
उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असताही जे परमार्थबुद्धी विसरतात, ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमतात अर्थात फिरून जन्ममरणाच्या चक्रात सापडतात. (३३)
मृत्तिका खाणोन घर केलें । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें ।
परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४॥
जमीन खणून लोक घर बांधतात व हे आपले घर अशी दृढ समजूत करून घेतात, पण वास्तविक ते अनेकांचे असते, हे त्यांना कळत नाही. (३४)
मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें ।
मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३५॥
उंदीर म्हणतात हे घर आमचे आहे, पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे आहे. (३५)
कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें ।
मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३६॥
याप्रमाणेच कांतण्या, मुगळे मुंग्या घर आमचे आहे असे म्हणतात. (३६)
विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर ।
झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३७॥
विंचू सर्प, झुरळे घर आमचेच म्हणतात. (३७)
भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्या म्हणती आमुचें घर ।
आळीका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८॥
भुगे, भ्रमरीची अळी व किडे म्हणतात की, लाकडात आमचेच घर आहे. (३८)
मार्जरें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर ।
मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३९॥
मांजरे, कुत्री, मुंगसे इत्यादी प्राणी घर आपले आहे, असे म्हणतात. (३९)
पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर ।
पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४०॥
पुंगळ वाळ्या, पिसवा घर आमचे आहे असे म्हणतात. (४०)
ढेकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर ।
घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४१॥
ढेकूण, लाल मुंगळे, घुंगुर्डी देखील घर आमचे आहे असे म्हणतात. (४१)
पिसोळे म्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर ।
सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंवी ॥ ४२॥
पिसोळे, गांधील माश्या, सोट आणि गोमा हे सुद्धा घर आमचेच आहे असे म्हणतात. (४२)
बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार ।
समस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३॥
अशा प्रकारचे खूपसे किडे, त्यांचे किती म्हणून वर्णन करावे ? सर्वच म्हणतात की, निश्चित हे घर आमचेच आहे. (४३)
पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर ।
घरीचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४४॥
पशू दासी, घरातील माणसे सर्वच म्हणतात की घर आमचे आहे. (४४)
पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर ।
ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५॥
एवढेच नव्हे तर पाहुणे, मित्र, ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात. (४५)
तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर ।
आग्न म्हणती आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६॥
चोर, राजकीय अधिकारी, एवढेच नव्हे तर अग्नीही म्हणतो की घर माझे आहे. याला मी जाळून खाक करतो. (४६)
समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें ।
सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥
याप्रमाणे सर्वच म्हणतात की, घर माझे आहे. तसेच हा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे. शेवटी त्या घरचे ओझे होते व ते सोडून, किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागते. (४७)
अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली ।
मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥
याप्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर्व गावच ओस पडतो. अखेर त्या घरांतून अरण्यातील हिंस्र श्वापदे येऊन राहतात. (४८)
किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक ।
हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥
वास्तविक ते घर किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचेच असते. ‘माझे-माझे’ म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. (४९)
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती ।
जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥
घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास ‘माझे-माझे’ म्हणतो ते खरे नसते, असा अनुभवही येतो; म्हणून जन्म म्हणजे या जगातील दोन दिवसांची वस्ती आहे, हे जाणून ती कुठे तरी करावी. (अर्थात कुठल्याही जागेची आसक्ती धरू नये). (५०)
देह म्हणावें आपुलें । तरी हें बहुतांकारणें निर्मिलें ।
प्राणीयांच्या माथां घर केलें । वा मस्तकीं भक्षिती ॥ ५१॥
आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते की, हा देह आपण आपला म्हणतो पण तेही खरे नाही. हा देही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्याचे डोके खातात. (५१)
रोमेमुळी किडे भक्षिती । खांडुक जाल्यां किडे पडती ।
पोटामध्ये जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२॥
रोमरंध्राच्या मुळाशी राहून किडे मांस खातात, कुठे खांडक झाले तर त्यातही किडे पडतात. पोटात जंत होतात. हे तर आपण पाहतोच. (५२)
कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी ।
कीड लागे कर्णासी । आणी गोमाशा भरती ॥ ५३॥
दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते, कानांना कीड लागली की तेथे गोमाशा गर्दी करतात. (५३)
गोचिड अशुद्ध सेविती । चामवा मांसांत घुसती ।
पिसोळे चाऊन पळती । अकस्मात ॥ ५४॥
गोचिडी रक्त पितात, चामवा मांसात घुसतात, तर पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात. (५४)
भोंगें गांधेंलें चाविती । गोंबी जळवा अशुद्ध घेती ।
विंचू सर्प दंश करिती । कानटें फुर्सीं ॥ ५५॥
भुंगे व गांधीलमाशा चावतात. तर गोमा आणि जळवा रक्त पितात. विंचू, साप, कानटे व फुरशी दंश करतात. (५५)
जन्मून देह पाळिलें । तें अकस्मात व्याघ्रें नेलें ।
कां तें लांडगींच भक्षिलें । बळात्कारें ॥ ५६॥
जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा, तर अकस्मात वाघ त्यास उचलून नेतो किंवा बळजबरीने मारून लांडगाच त्यास खाऊन टाकतो. (५६)
मूषकें मार्जरें दंश करिती । स्वानें अश्वें लोले तोडिती ।
रीसें मर्कटें मारिती । कासावीस करूनी ॥ ५७॥
उंदीर मांजर त्याला दंश करतात. कुत्री, घोडे वगैरे त्याचे लचके तोडतात, तर अस्वले, माकडे कासावीस करून मारतात. (५७)
उष्टरें डसोन इचलिती । हस्थी चिर्डून टाकिती ।
वृषभ टोचून मारिती । अकस्मात ॥ ५८॥
उंट चावून उचलून फेकून देतात तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात. (५८)
तश्कर तडतडां तोडिती । भूतें झडपोन मारिती ।
असो या देहाची स्थिती । ऐसी असे ॥ ५९॥
चोर तडतड शरीराचे तुकडे करतात, तर भुते अंगात संचार करून मारतात. असो. या देहाची स्थिती अशी आहे. (५९)
ऐसें शरीर बहुतांचें । मूर्ख म्हणे आमुचें ।
परंतु खाजें जिवांचें । तापत्रैं बोलिलें ॥ ६०॥
या दृष्टीने विचार केला, तर हा देह पुष्कळांचा आहे; पण मूर्ख माणूस त्यास ‘माझा’ असे समजतो. वास्तविक ते अनेक जीवांचे भक्ष्य आहे. तापत्रय वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे. (६०)
देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें ।
नाहीं तरी हें वेर्थची गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ॥ ६१॥
नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते; नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो मृत्यू पावतो. (६१)
असो जे प्रपंचिक मूर्ख । ते काये जाणती परमार्थसुख ।
त्या मूर्खांचें लक्षण कांहीं येक । पुढे बोलिलें असे ॥ ६२॥
असो. जे प्रापंचिक सुखात गढलेले मूर्ख लोक असतात, ते परमार्थाचे सुख काय जाणार ? अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत. (६२)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नरदेहस्तवननिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘नरदेहस्तवननिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक पहिला समाप्त ॥

श्रीमत् दासबोध

दशक दुसरा : मूर्खलक्षणाचा समास पहिला : मूर्खलक्षण श्रीराम

ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना ।
कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १ ॥

श्री समर्थ म्हणतात की ओंकारस्वरूप, एकदंत व त्रिनयन अशा गजाननाला मी नमन करतो. ”हे गजानना, तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे” अशी विनंती आहे. (१)

तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्मसुते ।
अंतरी वसे कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥

वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी श्री शारदा तिला वंदन करून तिने आपल्या अंतरी स्फूर्तिरूपाने राहावे, अशी मी तिला प्रार्थना करतो. (२)

वंदून सद्गुरुचरण । करून रघुनाथस्मरण ।
त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥ ३ ॥

नंतर सद्‌गुरुचरणांना वंदन करून व श्रीरामस्मरण करून समर्थ म्हणतात की, लोकांनी सोडून द्यावीत, म्हणून मी आता मूर्खांची लक्षणे वर्णन करतो. (३)

येक मूर्ख येक पढतमूर्ख । उभय लक्षणीं कौतुक ।
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ ४ ॥

मूर्खांचे दोन प्रकार असतात. काही मूर्ख तर काही पढतमूर्ख असतात. कौतुक म्हणून मी दोन्हींचे वर्णन करीत आहे. श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे. (४)

पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण ।
साअवध हो‍ऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५ ॥

पढतमूर्खाची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत. ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी. (५)

आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार ।
परि कांहीं येक तत्पर । हो‍ऊन ऐका ॥ ६ ॥

मूर्खाची लक्षणें सांगावयाची म्हटली, तर ती अपार आहेत. आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत. श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी. (६)

जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान ।
जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७ ॥

जे केवळ प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका. (७)

जन्मला जयांचे उदरीं । तयासि जो विरोध करी ।
सखी मनिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८ ॥

ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्मलो, त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्ख समजावा. (८)

सांडून सर्वही गोत । स्त्री‍आधेन जीवित ।
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९ ॥

सर्व नातेवाइकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो, तो एक मूर्खच. (९)

परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्वशुरगृही वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १० ॥

जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासुरवाडीस जाऊन राहातो किंवा कुळशीलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो, तो एक मूर्खच. (१०)

समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता ।
सामर्थ्येंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११ ॥

जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो, मनात स्वतःला त्यांच्या बरोबरीचे मानतो, अंगी सामर्थ्य नसतां लोकांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो, तोही एक मूर्खच. (११)

आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२ ॥

जो स्वतःच आपली स्तुती करतो, आपल्या देशांत असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो, तोही मूर्खच जाणावा. (१२)

अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी ।
जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३ ॥

कारण नसताना जो उगीचच हसतो, विवेक शिकवू गेले असतां जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो, तो एक मूर्खच. (१३)

आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री ।
परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४ ॥

स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, उठत बसता जो दुसऱ्याची निंदा करतो, तोही मूर्खच होय. (१४)

बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन ।
परस्थळीं बहु भोजन- । करी, तो येक मूर्ख ॥ १५ ॥

अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकट्टाच खुशाल झोपतो, किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो, तो एक मूर्खच. (१५)

मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न ।
सप्त वेसनीं जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६ ॥

आपला मान अथवा अपमान स्वतःच जो उघड करून सांगतो, किंवा ज्याचे मन सात प्रकारच्या व्यसनांत रमते, तो एक मूर्खच समजावा. (सात व्यसने म्हणजे द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारारमण, लघुपक्षीक्रीडा व नायकिणीचे गायन.) (१६)

धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकास ।
निसुगाईचा संतोष- । मानी, तो येक मूर्ख ॥ १७ ॥

जो दुसर्‍याचा भरवसा धरून स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडतो व आळसातच संतोष मानतो, तो एक मूर्ख. (१७)

घरीं विवेक उमजे । आणि सभेमध्यें लाजे ।
शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८ ॥

घरी ज्ञान सांगतो आणि सभेत बोलताना लाजतो, शब्द बोलताना घाबरतो, तो एक मूर्खच. (१८)

आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट ।
सिकवेणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९ ॥

आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याशी फाजील सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकवू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो, तोही मूर्खच होय. (१९)

नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसी जाणीव दावी ।
जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २० ॥

जो आपले ऐकत नाही त्यास जो शिकवतो, मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो, वडिलांना कमीपणा आणतो, तो एक मूर्ख. (२०)

येकायेकीं येकसरा । जाला विषईं निलाजिरा ।
मर्यादा सांडून सैरा- । वर्ते, तो येक मूर्ख ॥ २१ ॥

जो अचानक कामवासनेपायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो, तोही मूर्खच. (२१)

औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा ।
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ ।

जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थांत संतोष मानीत नाही, तो एक मूर्खच होय. (२२)

संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी ।
उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३ ॥

सोबतीशिवाय जो विदेशात जातो, अनोळखी माणसाची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो, तो मूर्ख समजावा. (२३)

आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन ।
रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४ ॥

जो जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो, आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही, तो एक मूर्खच. (२४)

सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित ।
सर्वकाळ दुश्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५ ॥

आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहातो; अथवा ज्याचे चित्त सर्वकाळ अस्थिर असते, तोही मूर्खच जाणावा. (२५)

विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण ।
स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६ ॥

कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसताही विनाकारण दंड करतो, किंवा जो थोडक्यासाठी कंजूष बनतो, तो मूर्ख जाणावा. (२६)

देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ।
ज्याचे मुखीं भंडउशभंड । तो येक मूर्ख ॥ २७ ॥

जो देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही. स्वतः अशक्त असून शिवीगाळ करतो, कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो, तो मूर्खच जाणावा. (२७)

घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा ।
ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८ ॥

घरच्या लोकांशी रागाने वागतो, त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो असा जो कोणी वेडा, अज्ञानी असेल तो मूर्खच समजावा. (२८)

नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत ।
मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९ ॥

जो नीच जातींच्या लोकांत राहतो, परस्त्रीशी एकांत करतो, वाटेने जाताना खात खात जातो, तो एक मूर्खच. (२९)

स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार ।
करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३० ॥

स्वतः तर परोपकार करीतच नाही, कुणी उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करतो. करतो थोडे पण बोलतो फार, असा माणूस मूर्खच होय. (३०)

तपीळ खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं ।
धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१ ॥

जो तापट खादाड आळशी आहे, दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटिल आहे व ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही, तो मूर्खच होय. (३१)

विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान ।
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२ ॥

स्वतःजवळ विद्या, वैभव, धन किंवा कुठलाही पुरुषार्थ, सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाच अभिमान बाळगतो, तो एक मूर्खच. (३२)

लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड ।
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३ ॥

उर्मट खोटा, लबाड वाईट कृत्ये करणारा, कुटिल, नामर्द व जो फार झोपतो, तो एक मूर्खच होय. (३३)

उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे ।
सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४ ॥

उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो. शौचादी क्रिया जो चव्हाट्यावर करतो व सर्वकाळ जवळ जवळ वस्त्रहीन असतो, तोही मूर्खच जाणावा. (३४)

दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण ।
सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५ ॥

ज्याचे दात, डोळे, नाक, हात, पाय, कपडे इत्यादी सर्वकाळ अत्यंत मलिन असतात, तोही मूर्खच. (३५)

वैधृति आणी वितिपात । नाना कुमुहूर्तें जात ।
अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६ ॥

जो गावाला जाताना वैधृती, व्यतिपात इत्यादी विविध कुमुहूर्तांवर प्रयाण करतो, एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्यांचाही घात करतो, तो मूर्ख जाणावा. (३६)

क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी ।
जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७ ॥

जो कुणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो, तसेच ज्यास दृढ बुद्धी नाही, तो मूर्खच जाणावा. (३७)

जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी ।
नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८ ॥

आपल्या जिवलग माणसांना जो दुःख देतो, कधी सुखाचा शब्दही ऐकवत नाही आणि नीच माणसांना मात्र वंदन करतो, तो एक मूर्खच. (३८)

आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी ।
लक्ष्मीचा भरवसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९ ॥

स्वतःस नानापरीने जपतो, पण शरण आलेल्यांचे रक्षण करीत नाही व संपत्तीचा भरवसा धरतो, तो मूर्खच जाणावा. (३९)

पुत्र कळत्र आणी दारा । इतुकाचि मानुनियां थारा ।
विसरोन गेला ईश्वरा । तो येक मूर्ख ॥ ४० ॥

आपला मुलगा, कुटुंब, पत्नी हाच आपला आधार आहे, असे समजून जो देवाला विसरून जातो, तोही मूर्खच होय. (४०)

जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावाअवें ।
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१ ॥

जसे करावे तसे फळ मिळते, हे ज्याला कळत नाही, तोही मूर्खच समजावा. (४१)

पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्वरी देणें ।
ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२ ॥

पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी आठपट अधिक कामवासना असते. अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो, तो मूर्खच जाणावा. (४२)

दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले ।
दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३ ॥

दुर्जनाच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व दिवसाही डोळे झाकून घेतो, ज्ञान असून मुद्दाम अज्ञान्यासारखा वागतो, तोही मूर्खच. (४३)

देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही ।
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४ ॥

जो देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही असतो, तो मूर्खच जाणावा. (४४)

परपीडेचें मानी सुख । पससंतोषाचें मानी दुःख ।
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५ ॥

लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते व लोकांना आनंद झाला असता जो दुःखी होतो व हरवलेल्या वस्तूसाठी जो शोक करतो, तो मूर्खच होय. (४५)

आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६ ॥

कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही, कुणी न विचारताच साक्ष देतो व निंद्य वस्तूचा स्वीकार करतो तो मूर्खच जाणावा. (४६)

तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले ।
कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७ ॥

महत्त्व सोडून जो वायफळ बडबडतो, उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो व नीच कर्मे करणारांशी जो मैत्री करतो, तो मूर्खच होय. (४७)

पत्य राखों नेणें कदा । विनोद करी सर्वदा ।
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८ ॥

जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही, सदासर्वदा चेष्टामस्करी करतो, त्याला कुणी हसले तर मात्र चिडतो आणि भांडायला लागतो, तोही मूर्खच होय. (४८)

होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड ।
बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९ ॥

जो अवघड पैज मारतो, किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही, तो मूर्ख जाणावा. (४९)

वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे ।
जो गोत्रजांस विश्वासे । तो येक मूर्ख ॥ ५० ॥

स्वतःजवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो तो व जो भाऊबंदांवर विश्वास ठेवतो, ते दोघेही मूर्खच ! (५०)

तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे ।
आपलें आन्हीत करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१ ॥

जो चोराला आपली माहिती देतो, जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागारागाने आपलेच अनहित करतो, तो मूर्खच असतो. (५१)

हीन जनासीं बरोबरी । बोल बोले सरोत्तरीं ।
वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२ ॥

हीन लोकांशी जो बरोबरी करतो, उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो, तो मूर्ख जाणावा. (५२)

समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी ।
घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३ ॥

श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा, अलभ्य वस्तूचा हेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय. (५३)

सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा ।
सार्थकेंविण वेंची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४ ॥

ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरवसा धरतो आणि मनुष्यजीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवितो, तो एक मूर्खच होय. (५४)

संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें ।
मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५ ॥

संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्रांचे दोष जो लोकांत उघड करून सांगतो, तो एक मूर्खच. (५५)

अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी ।
जो विस्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६ ॥

कुणी लहानसहान अपराध केला तरी जो क्षमा करीत नाही व त्या व्यक्तीस सारखे धारेवर धरतो, तसेच जो विश्वासघात करतो, तो एक मूर्खच जाणावा. (५६)

समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे ।
क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७ ॥

जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो, सभा ज्याला विटते, कंटाळते, जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो, तो मूर्खच असतो. (५७)

बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक ।
ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८ ॥

कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कुणी योग्य नेता नसतो, तो मूर्खच जाणावा. (५८)

अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी ।
संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९ ॥

जो अनीतीने द्रव्य मिळवितो, धर्म, नीती, न्याय यांची पर्वा करत नाही, आपल्या सहकाऱ्यांना दुखावतो, तो एक मूर्खच होय. (५९)

घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी ।
बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी । तो येक मूर्ख ॥ ६० ॥

घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो, अनेक लोकांचे उष्टे जो स्वीकारतो तोही मूर्खच. (६०)

आपुलें अर्थ दुसयापासीं । आणी दुसयाचें अभिळासी ।
पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१ ॥

आपले द्रव्य दुसऱ्यापाशी ठेवतो व दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो, हलक्या लोकांच्या बरोबर देण्याघेण्याचा व्यवहार करतो, तो मूर्ख जाणावा. (६१)

अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे ।
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२ ॥

जो अतिथीला त्रास देतो, कुग्रामात राहातो व सदा सर्वदा चिंता करीत असतो, तो मूर्ख समजावा. (६२)

दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें ।
डो‍ई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३ ॥

दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असता हा तिसरा विनाकारणच तेथे जाऊन बसतो व दोन्ही हातांनी डोके खाजवितो, त्यास मूर्खच म्हणावे लागेल. (६३)

उदकामधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी ।
सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४ ॥

स्वच्छ पाण्यात चूळ टाकतो, पायाने पाय खाजवतो, हीनकुळाची सेवा करतो, तो एक मूर्खच. (६४)

स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें ।
मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५ ॥

स्त्रिया व मुले यांच्यात उगीचच मिसळतो, पिशाच्चाजवळ जाऊन बसतो, कुत्रे पाळतो, पण त्यास शिस्त लावत नाही, तो एक मूर्खच. (६५)

परस्त्रीसीं कळह करी । मुकी वस्तु निघातें मारी ।
मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६ ॥

जो परस्त्रीशी भांडतो, मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो, मूर्ख माणसाची संगत करतो, तो मूर्ख जाणावा. (६६)

कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे ।
खरें अस्ता खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७ ॥

जो भांडणतंटा पाहात उभा असतो, तो सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. उलट कौतुकाने बघतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो एक मूर्खच होय. (६७)

लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी ।
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८ ॥

संपत्ती प्राप्त झाली असता जो जुनी ओळख ठेवत नाही व देवाब्राह्मणांवर सत्ता गाजवतो, तो मूर्ख जाणावा. (६८)

आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी ।
पुढीलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९ ॥

जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत, जो इतरांशी नम्रतेने वागतो. मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही, तोही मूर्खच. (६९)

अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७० ॥

जो वाचताना अक्षरे गाळतो किंवा पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही, तो मूर्खच होय. (७०

आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी ।
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१ ॥

जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही, बासनात बांधून ठेवून देतो, तोही मूर्खच जाणावा. (७१)

ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे ।
चीत्त दे‍उनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥

अशी ही मूर्खलक्षणे अपार आहेत. यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बाणते. म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने यांचे श्रवण करतात. (७२)

लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती ।
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ७३ ॥

मूर्खांची लक्षणे अपार आहेत. पण त्यातील काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती वर्णन केली आहेत. तरी श्रोत्यांनी क्षमा करावी. (७३)

उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं ।
पुढिले समासी आघवीं । निरोपिलीं ॥ ७४ ॥

मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत, यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन केले आहे. (७४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥ १ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसवादे ‘मूर्खलक्षणनाम’ समास पहिला समाप्त.

समास दुसरा : उत्तमलक्षण

॥ श्रीराम ॥

श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥

आता मी उत्तम गुणांची लक्षणे वर्णन करून सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत. ही लक्षणे जर ग्रहण केली, तर अंगी सर्वज्ञता बाणते. (१)

वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घे‍ऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥

कुठेही जाताना योग्य प्रकारे मार्गाची चौकशी केल्याशिवाय जाऊ नये. फळ खाण्यापूर्वी त्यासंबंधी व्यवस्थित माहिती घेऊन मग ते खावे. वाटेत एखादी वस्तू पडलेली दिसली, तर ती एकाएकी उचलून घेऊ नये. (२)

अति वाद करूं नये । पोटीं कपट धरूं नये ।
शोधल्याविण करूं नये । कुळहीन कांता ॥ ३ ॥

फार वादविवाद करू नये. कुणाशीही कपटाने वागू नये, कुलशीलाची चौकशी केल्याखेरीज कुणाही मुलीशी विवाह करू नये. (३)

विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।
मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥ ४ ॥

विचार केल्याखेरीज बोलू नये. पूर्वचर्चेशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू नये. लोकात वागताना मर्यादेचे पालन जरूर करावे. (४)

प्रीतीविण रुसों नये । चोरास वोळखी पुसों नये ।
रात्री पंथ क्रमूं नये । येकायेकीं ॥ ५ ॥

प्रेम नसेल तर तेथे रुसू नये. चोरास परिचय विचारू नये. रात्री एकट्याने प्रवास करू नये. (५)

जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥

लोकांत सरळपणा कधी सोडू नये, पापमार्गाने द्रव्य मिळवू नये. कुठल्याही बिकट प्रसंगीही सन्मार्ग सोडू नये. (६)

निंदा द्वेष करूं नये । असत्संग धरूं नये ।
द्रव्यदारा हरूं नये । बळात्कारें ॥ ७ ॥

कुणाचीही निंदा करू नये, कुणाचा द्वेष करू नये, वाईट संगत धरू नये आणि बळजबरीने लोकांचे द्रव्य अथवा स्त्री यांचे अपहरण करू नये. (७)

वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये ।
विद्याअभ्यास सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ८ ॥

वक्ता बोलत असता मध्येच त्याचे खंडण करू नये. लोकांची एकी असेल तर त्यात भांडण लावून देऊन फूट पाडू नये. विद्याभ्यास करणे कधीही सोडू नये. (८)

तोंडाळासि भांडों नये । वाचाळासी तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥

तोंडाळ माणसाशी भांडायला जाऊ नये. वाचाळाशी वाद घालू नये आणि अंतर्यामी संतांची संगती कधीही सोडू नये. (९)

अति क्रोध करूं नये । जिवलगांस खेदूं नये ।
मनीं वीट मानूं नये । सिकवणेचा ॥ १० ॥

अति क्रोध करू नये. आपल्या प्रिय व्यक्तीला कधी दुखवू नये. कुणी आपल्या चांगल्यासाठी आपणास चार गोष्टी शिकवत असेल, तर त्याचा कंटाळा मानू नये. (१०)

क्षणाक्षणां रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये ।
केल्याविण सांगों नये । आपला पराक्रमु ॥ ११ ॥

वरचेवर रुसू नये. उगीच खोट्या फुशारक्या मारू नयेत. पराक्रम न करताच उगीच बढाया मारू नयेत. (११)

बोलिला बोल विसरों नये । प्रसंगी सामर्थ्य चुकों नये ।
केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसि कदा ॥ १२ ॥

आपण कुणाला शब्द दिला तर तो कधी विसरू नये. योग्य वेळी बळाचा उपयोग केल्याखेरीज राहू नये. आपण करून दाखविल्याखेरीज दुसऱ्याचा कधी तिरस्कार करू नये. (१२)

आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिलुआविण करूं नये । कार्य कांहीं ॥ १३ ॥

आळसात कधीही सुख मानू नये. कुणाची चहाडी करण्याचे कधी मनातही आणू नये. सर्व प्रकारे उलटसुलट विचार करूनच कोणतेही कार्य करावे. (१३)

सुखा आंग दे‍ऊं नये । प्रेत्न पुरुषें सांडूं नये ।
कष्ट करितां त्रासों नये । निरंतर ॥ १४ ॥

देहाचे फार चोचले करू नयेत. पुरुषाने प्रयत्न करणे कधीही सोडू नये. निरंतर कष्ट करावे लागले तरी त्रासू नये. (१४)

सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । काहीं केल्या ॥ १५ ॥

सभेमध्ये लाजू नये किंवा बाष्कळपणे वटवट करू नये, कुठल्याही परिस्थितीत पैजा मारू नये. (१५)

बहुत चिंता करूं नये । निसुगपणें राहों नये ।
परस्त्रीतें पाहों नये । पापबुद्धी ॥ १६ ॥

फार चिंता करू नये. निष्काळजीपणे राहू नये. परस्त्रीकडे कधीही पापबुद्धीने पाहू नये. (१६)

कोणाचा उपकार घे‍ऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विस्वासघात ॥ १७ ॥

शक्यतो कुणाकडून उपकार घेऊ नये. काही कारणाने घ्यावा लागला तर तो फेडल्याशिवाय राहू नये. परपीडा अथवा विश्वासघात कधीही करू नये. (१७)

शोच्येंविण असों नये । मळिण वस्त्र नेसों नये ।
जणारास पुसों नये । कोठें जातोस म्हणौनी ॥ १८ ॥

कधी अस्वच्छ, अशुद्ध राहू नये. मलिन वस्त्रे नेसू नयेत किंवा कुणी बाहेर जाण्यास निघाला असेल, तर ‘कोठे जातोस’ असेही कधी विचारू नये. (१८)

व्यापकपण सांडूं नये । पराधेन हो‍ऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ॥ १९ ॥

आपल्या अंतःकरणाची विशालता, औदार्य कधी सोडू नये. दुसऱ्याच्या आधीन होऊन राहू नये व आपला भारही दुसऱ्या कुणावर कधी घालू नये. (१९)

पत्रेंविण पर्वत करूं नये । हीनाचें रुण घे‍ऊं नये ।
गोहीविण जाऊं नये । राजद्वारा ॥ २० ॥

लेखी कागदपत्राशिवाय कधी देण्याघेण्याचा व्यवहार करू नये. नीच माणसांकडून कधी कर्ज घेऊ नये. साक्षीपुराव्याशिवाय राजदरबारी- कोर्टकचेरीत कधी जाऊ नये (२०)

लटिकी जाजू घे‍ऊं नये । सभेस लटिकें करूं नये ।
आदर नस्तां बोलों नये । स्वभाविक ॥ २१ ॥

कुणावरही खोटा आरोप करू नये. सभेस खोटे ठरवू नये. जेथे आपल्याविषयी आदर नसेल तेथे स्वाभाविकपणे बोलायला जाऊ नये. (२१)

आदखणेपण करूं नये । अन्यायेंविण गांजूं नये ।
अवनीतीनें वर्तों नये । आंगबळें ॥ २२ ॥

कुणाचाही मत्सर करू नये, उगीच अन्यायाने कुणालाही छळू नये. शरीरबळाच्या जोरावर कधीही अन्यायाने वागू नये. (२२)

बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करूं नये ।
बहुत दिवस राहूं नये । पिसुणाचेथें ॥ २३ ॥

अती आहार घेऊ नये. फार झोपही काढू नये. दुष्ट माणसाच्या घरी कधी फार दिवस राहू नये. (२३)

आपल्याची गोही दे‍ऊं नये । आपली कीर्ती वर्णूं नये ।
आपलें आपण हांसों नये । गोष्टी सांगोनी ॥ २४ ॥

केवळ आपला माणूस असे समजून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये. आपली कीर्ती आपणच वर्णन करून सांगू नये. गोष्टी सांगताना आपणच हसू नये. (२४)

धूम्रपान घे‍ऊं नये । उन्मत्त द्रव्य सेवूं नये ।
बहुचकासीं करूं नये । मैत्री कदा ॥ २५ ॥

धूम्रपान करू नये. मादक पदार्थाचे सेवन करू नये. वाचाळाशी मैत्री करू नये. (२५)

कामेंविण राहों नये । नीच उत्तर साहों नये ।
आसुदें अन्न से‍ऊं नये । वडिलांचेंहि ॥ २६ ॥

कामाशिवाय कधी मोकळे बसू नये. नीच उत्तर सहन करू नये. वडिलांचे असले तरी आयते अन्न कधी खाऊ नये. (२६)

तोंडीं सीवी असों नये । दुसयास देखोन हांसों नये ।
उणें अंगीं संचारों नये । कुळवंताचे ॥ २७ ॥

तोंडात शिवी नसावी. दुसऱ्याला पाहून त्याचा उपहास करून हसू नये. चांगल्या कुळातील माणसांचे अंगी उगीच कमीपणा चिकटवू नये. (२७)

देखिली वस्तु चोरूं नये । बहुत कृपण हो‍ऊं नये ।
जिवलगांसी करूं नये । कळह कदा ॥ २८ ॥

जी वस्तू दिसेल ती चोरू नये, अत्यंत कृपण होऊ नये. आपल्या जिवलगांशी कधी भांडण करू नये. (२८)

येकाचा घात करूं नये । लटिकी गोही दे‍ऊं नये ।
अप्रमाण वर्तों नये । कदाकाळीं ॥ २९ ॥

कोणाचाही घात करू नये. खोटी साक्ष देऊ नये. अमर्याद वर्तन कधीही करू नये. (२९)

चाहाडी चोरी धरूं नये । परद्वार करूं नये ।
मागें उणें बोलों नये । कोणीयेकाचें ॥ ३० ॥

कुणाची चहाडी करू नये, कुठलीही चोरी करू नये. परस्त्रीशी संबंध ठेवू नये व कुणाचेही पाठीमागे त्याची निंदा करू नये. (३०)

समईं यावा चुकों नये । सत्वगुण सांडूं नये ।
वैरियांस दंडूं नये । शरण आलियां ॥ ३१ ॥

प्रसंगी धैर्य दाखविण्यास चुकू नये. सत्त्वगुण कधी सोडू नये. शत्रू जर शरण आला तर त्यास कधी दंड देऊ नये. (३१)

अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये ।
मर्यादेविण चालों नये । पवित्र जनीं ॥ ३२ ॥

थोड्याशा ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नये. हरिभक्ती करण्यास कधी लाजू नये. पवित्र लोकांत वाटेल तसे अमर्याद वागू नये. (३२)

मूर्खासीं संमंध पडों नये । अंधारीं हात घालूं नये ।
दुश्चितपणें विसरों नये । वस्तु आपुली ॥ ३३ ॥

मूर्खाशी मैत्री करण्यास जाऊ नये. अंधारात कधी हात घालू नये. वेंधळेपणाने आपली वस्तू कुठेही विसरू नये. (३३)

स्नानसंध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये ।
अनाचार मांडूं नये । चुकुरपणें ॥ ३४ ॥

स्नानसंध्या (नित्यकर्म) सोडू नये. कुळाचारात खंड पडू देऊ नये. कष्टास घाबरून आळसाने अनाचार करू नये. (३४)

हरिकथा सांडूं नये । निरूपण तोडूं नये ।
परमार्थास मोडूं नये । प्रपंचबळें ॥ ३५ ॥

हरिकथेचे श्रवण, कीर्तन सोडू नये. अध्यात्मनिरूपण टाळू नये. प्रपंचांत दंग होऊन परमार्थाचा त्याग करू नये. (३५)

देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये ।
भलते भरीं भरों नये । विचारेंविण ॥ ३६ ॥

देवाचा नवस फेडण्यास चुकू नये. आपल्या धर्माचा त्याग करू नये. विचार न करता भिडेस बळी पडून भलतेसलते करू नये. (३६)

निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये ।
पा‍उस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥

निष्ठुरपणा करू नये, कुणाही जीवाची हत्या करू नये. फार पाऊस पडत असता किंवा अयोग्य वेळी कुठे जाऊ नये. (३७)

सभा देखोन गळों नये । समईं उत्तर टळों नये ।
धिःकारितां चळों नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥

सभा पाहून गडबडून जाऊ नये. वेळप्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये. कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चळू देऊ नये. (३८)

गुरुविरहित असों नये । नीच यातीचा गुरु करूं नये ।
जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥

गुरूवाचून राहू नये पण हलक्या जातीचा गुरू करू नये. वैभवाच्या योगे आयुष्य ही शाश्वत टिकणारी वस्तू आहे असे समजू नये. (३९)

सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घे‍ऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥

सत्यमार्ग कधीही सोडू नये. खोट्या मार्गाने कधी जाऊ नये व खोट्याचा अभिमानही बाळगू नये. (४०)

अपकीर्ति ते सांडावी । सद्की्र्ति वाढवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥

अपकीर्ती कधीही होऊ देऊ नये. सत्कीर्ती वाढवावी. विचारपूर्वक नेहमी सत्याचीच वाट दृढ धरावी. (४१)

नेघतां हे उत्तम गुण । तें मनुष्य अवलक्षण ।
ऐक तयांचे लक्षण । पुढिले समासीं ॥ ४२ ॥

हे उत्तम गुण जो घेत नाही, तो मनुष्य अवलक्षणी समजावा. पुढील समासात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन ऐका. (४२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उत्तामलक्षणनाम समास दुसरा ॥ २ ॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘उत्तमलक्षणनाम’ समास दुसरा समाप्त.

समास तिसरा : कुविद्यालक्षण

॥ श्रीराम ॥

ऐका कुविद्येचीं लक्षणें । अति हीनें कुलक्षणें ।
त्यागार्थ बोलिलीं ते श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥

आता कुविद्येची अति हीन अशी कुलक्षणे, त्यांचा त्याग करावा म्हणून वर्णन करून सांगतो, ती ऐकावी. (१)

ऐका कुविद्येचा प्राणी । जन्मा ये‍ऊन केली हानी ।
सांगिजेल येहीं लक्षणीं । वोळखावा ॥ २ ॥

आता कुविद्येचा प्राणी कसा ओळखावा ते त्याची जी लक्षणे वर्णन करतो त्यावरून कळेल त्याने जन्मास येऊन स्वतः चे अत्यंत नुकसान करून घेतलेले असते. (२)

कुविद्येचा प्राणी असे । तो कठिण निरूपणें त्रासे ।
अवगुणाची समृद्धि असे । म्हणौनियां ॥ ३ ॥

कुविद्येचा जो मनुष्य असतो, त्याच्या ठिकाणी अवगुणाची खाण असल्याने अवघड निरूपणाने तो त्रासून जातो. (३)

श्लोक ॥ दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम ॥

अर्थ : अर्जुना, आतां आसुरी संपत्तीचे गुण तुला सांगतो. आसुरी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषामध्ये पुढील गुण दिसतात. ‘ मी मोठा धार्मिक आहे ’ असे बाह्य वेष व आचार यांवरून लोकांस भासविणे, हा दंभ; पुष्कळ धन असणे, किंवा पिता, बंधु इत्यादि आप्त मोठा अधिकारी – राजाप्रभृति असणे, यामुळे सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जो मद उत्पन्न होतो, तो दर्प होय; अशा दर्पाने युक्त असलेला पुरुष मोठमोठ्या विद्वान् व शीलसंपन्न पुरुषांचाहि धिक्कार करतो. त्याचप्रमाणे ‘ मी उत्कृष्ट आहे ’ असे मानणे, कोप, कठोर – मर्मभेदक शब्द बोलणे, जसे कुरूपाला सुस्वरूप, हीनाला उत्तम, आंधळ्याला डोळस, इत्यादि म्हणणे व कर्तव्याकर्तव्याविषयीचे अविवेकज्ञानमिथ्याप्रत्यय; हे पांच गुण राजस पुरुषांमध्ये मुख्यतः असतात.

काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार ।
गर्व ताठा अहंकार । द्वेष विषाद विकल्पी ॥ ४ ॥
आशा ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना ।
असूय अविज्ञा ईषणा वासना । अतृप्ती लोलंगता ॥ ५ ॥
इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा । आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।
जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ती दुर्वासना ॥ ६ ॥
स्पर्धा खटपट आणि चटचट । तर्हे झटपट आणी वटवट ।
सदा खटपट आणी लटपट । परम वेथा कुविद्या ॥ ७ ॥

अर्थ – दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही आसुरी संपत्तीची लक्षणे आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, (लोकेषणा, वित्तेषणा, दारेषणा किंवा कुणी म्हणतात पुत्रेषणा या) तीन ईषणा, वासना, अतृप्ती, आसक्ती, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनीती, गावगुंडपणा करणे, सदा मस्तीत राहणे, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट आणि लटपट तर्‍हेवाईकपणा, झटपट काम उरकण्याची घाई, वटवट करणे, सदा तक्रार करण्याचा स्वभाव, कसे तरी काम उरकणे, ही सर्व कुविद्येची लक्षणे असून कुविद्या हा एक भयंकर रोगच आहे. (४-७)

कुरूप आणी कुलक्षण । अशक्त आणी दुर्जन ।
दरिद्री आणी कृपण । आतिशयेंसीं ॥ ८ ॥

कुविद्येचा माणूस कुरूप आणि कुलक्षणी, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री असून अतिशय कंजूष असतो. (८)

आळसी आणी खादाड । दुर्बळ आणी लाताड ।
तुटक आणी लाबाड । आतिशयेंसीं ॥ ९ ॥

तो आळशी आणि खादाड असतो व दुर्बळ असूनही उर्मट व अत्यंत लबाड आणि फटकून वागणारा असतो. (९)

मूर्ख आणी तपीळ । वेडें आणी वाचाळ ।
लटिकें आणी तोंडाळ । आतिशयेंसीं ॥ १० ॥

तो मूर्ख असून तापट वेडा असून वाचाळ खोल असूनही अतिशय तोंडाळ असतो. (१०)

नेणे आणी नायके । न ये आणी न सीके ।
न करी आणी न देखे । अभ्यास दृष्टी ॥ ११ ॥

स्वतःला काही कळत नाही, तरी दुसऱ्याचे ऐकत नाही. स्वतःस काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर शिकतही नाही. स्वतः काही करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहातही नाही. (११)

अज्ञान आणी अविस्वासी । छळवादी आणी दोषी ।
अभक्त आणी भक्तांसी । देखों सकेना ॥ १२ ॥

अज्ञानी असून अविश्वासी, लोकांना छळणारा, दोषी, अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. (१२)

पापी आणी निंदक । कष्टी आणी घातक ।
दुःखी आणी हिंसक । आतिशयेंसीं ॥ १३ ॥
हीन आणी कृत्रिमी । रोगी आणी कुकर्मी ।
आचंगुल आणी अधर्मी । वासना रमे ॥ १४ ॥

पापी, निंदा करणारा, स्वत: दुःखी-कष्टी असून लोकांचा घात करणारा आणि हिंसक, अतिशय क्रूर असा असतो. हीन बुद्धीचा असून दुसऱ्याची नक्कल करणारा, रोगी असून कुकर्म करणात, कृपण असूनही अधर्मात जो रमतो असा असतो. (१३-१४)

हीन देह आणी ताठा । अप्रमाण आणी फांटा ।
बाष्कळ आणी करंटा । विवेक सांगे ॥ १५ ॥

देह हीन असूनही त्याच्या अंगी गर्व असतो, स्वतः अप्रमाण म्हणजे अमर्यादशील असून फाटे फोडणारा असतो. अर्थहीन बडबड करणारा, अभागी असून दुसऱ्याला विवेकाच्या गोष्टी सांगत असतो. (१५)

लंडी आणी उन्मत्त । निकामी आणी डुल्लत ।
भ्याड आणी बोलत । पराक्रमु ॥ १६ ॥

तो भित्रा असून उन्मत्त असतो, कुचकामाचा असून ऐट मिरविणारा आणि भ्याड असून पराक्रमाच्या बढाया मारणारा असतो. (१६)

कनिष्ठ आणी गर्विष्ठ । नुपरतें आणी नष्ट ।
द्वेषी आणी भ्रष्ट । आतिशयेंसीं ॥ १७

तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ असतो, विषयासक्त असून नष्ट असतो व अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट असतो. (१७)

अभिमानी आणी निसंगळ । वोडगस्त आणी खळ ।
दंभिक आणी अनर्गळ । आतिशयेंसीं ॥ १८ ॥

अभिमानी असून निर्लज्ज, संकटात सापडलेला असूनही दुष्ट अत्यंत दांभिक आणि मिथ्या बोलणारा असतो. (१८)

वोखटे आणी विकारी । खोटे आणी अनोपकारी ।
अवलक्ष्ण आणी धिःकारी । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥

अती लंपट व विकारी, खोय्टा आणि अपकार करणारा, अवलक्षणी असूनही प्राणिमात्रांचा धिक्कार करणारा असतो. (१९)

अल्पमती आणी वादक । दीनरूप आणि भेदक ।
सूक्ष्म आणी त्रासक । कुशब्दें करूनि ॥ २० ॥

मंदबुद्धीचा असून वाद घालतो, दीनवाणा असूनही मर्मभेदक बोलतो, धूर्त कपटी असून वाईट शब्दाने लोकांना त्रास देणारा असतो. (२०)

कठिणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी ।
दुःखवचनी तीव्रवचनी । क्रूर निष्ठुर दुरात्मा ॥ २१ ॥

तो कठोर वचने बोलणारा, कर्कश आवाजात ओरडून बोलणारा, कपटी वचने बोलणारा व संशययुक्त बोलणारा, मर्मभेदक, लोकांना दुःख होईल असे टोचून बोलणारा, अत्यंत कूर निष्ठुर दुरात्माच असतो. (२१)

न्यूनवचनी पैशून्यवचनी । अशुभवचनी अनित्यवचनी ।
द्वेषवचनी अनृत्यवचनी । बाष्कळवचनी धिःकारु ॥ २२ ॥

तो दुसऱ्याचे न्यून उघड करणारा, लावालावी करणारा, चहाडखोर अशुभ शब्द बोलणारा, बोलणे फिरविणारा, द्वेषयुक्त, असत्य भाषण करणारा व बाष्कळपणे लोकांचा धिक्कार करणारा असतो. (२२)

कओअटी कुटीळ गाठ्याळ । कुर्टें कुचर नट्याळ ।
कोपी कुधन टवाळ । आतिशयेंसीं ॥ २३ ॥

तो कपटी, कुटिल, आंतल्या गाठीचा, मनांतल्या मनांत कुढणारा, कामचुकार, नष्ट तापट, वाईट मार्गाने द्रव्य मिळविणारा व अत्यंत टवाळखोर असतो. (२३)

तपीळ तामस अविचार । पापी अनर्थी अपस्मार ।
भूत समंधी संचार । आंगीं वसे ॥ २४ ॥

तो तापट तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्मारांनी पीडित व ज्याच्या अंगात भूत, समंधादी संचारतात असा असतो. (२४)

आत्महत्यारा स्त्रीहत्यारा । गोहत्यारा ब्रह्महत्यारा ।
मातृहत्यारा पितृहत्यारा । माहापापी पतित ॥ २५ ॥

तो आत्महत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, मातृहत्या, पितृहत्या करणारा अत्यंत पतित आणि महापातकी असतो. (२५)

उणें कुपात्र कुतर्की । मित्रद्रोही विस्वासघातकी ।
कृतघ्न तल्पकी नारकी । अतित्याई जल्पक ॥ २६ ॥

तो सर्वच बाबतीत उणा म्हणजे कमी दर्जाचा असून नालायक, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतघ्न, मात्रागमनी, नरकात जाण्यास योग्य, अघोरी व बडबड्या असतो. (२६)

किंत भांडण झगडा कळहो । अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो ।
चाहाड वेसनी विग्रहो । निग्रहकर्ता ॥ २७ ॥

संशय बाळगणारा, भांडण, झगडा, कलह करणारा, अधर्माने, रूढीविरुद्ध वागणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर व्यसनी, फूट पाडणारा व लोकांना धाकात ठेवणारा असतो. (२७)

द्वाड आपेसी वोंगळ । चाळक चुंबक लच्याळ ।
स्वार्थी अभिळासी वोढाळ । आद्दत्त झोड आदखणा ॥ २८ ॥

तो द्वाड, अपयशी, अस्वच्छ, चाळविणारा, कंजूष, लोचट, स्वार्थी, अभिलाषी, आसक्त, कवडीचुंबक, कोडगा, द्वेष करणारा असतो. (२८)

शठ शुंभ कातरु । लंड तर्मुंड सिंतरु ।
बंड पाषांड तश्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥

तो लबाड बेअकली, भ्याड, नाही तेथे डोके खुपसणारा, ठक, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्याच्या वस्तू पळविणारा असतो. (२९)

धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजट ।
थोट उद्धट लंपट । बटवाल कुबुद्धी ॥ ३० ॥

तो साहसी, स्वैराचारी, मोकाट वागणारा, बडबड्या, चावट वात्रट कुभांड रचणारा, उद्धट लंपट भ्रष्ट व कुबुद्धी असतो. (३०)

मारेकरी वरपेकरी । दरवडेकरी खाणोरी ।
मैंद भोंदु परद्वारी । भुररेकरी चेटकी ॥ ३१ ॥

तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर काळीजखाऊ, मैंद, भोंदू बाहेरख्याली, मोहिनीविद्येने भुलविणारा, चेटूक करणारा असतो. (३१)

निशंक निलाजिरा कळभंट । टौणपा लौंद धट उद्धट ।
ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ॥ ३२ ॥

तो निःशंक, निलाजरा, भांडकुदळ टोणपा, गलेलठ्ठ, धटिंगण व उद्धट असून नफ्फट अक्षरशत्रू शठ, नष्ट सार्‍या जगाशी भांडणारा व विकारी असतो. (३२)

अधीर आळिका अनाचारी । अंध पंगु खोकलेंकरी ।
थोंटा बधिर दमेकरी । तर्ह्ही ताठा न संडी ॥ ३३ ॥

तो उतावळ्या स्वभावाचा, हावरा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकलेकरी, थोय, बहिरा, दमेकरी असा रोगजर्जर असूनही ताठा न सोडणारा असतो. (३३)

विद्याहीन वैभवहीन । कुळहीन लक्ष्मीहीन ।
शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीन भिकारी ॥ ३४ ॥

तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारीच असतो. (३४)

बळहीन कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन ।
लक्षणहीन लावण्यहीन । आंगहीन विपारा ॥ ३५ ॥

तो बल्लीन, कळहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन कुरूप असा असतो. (३५)

युक्तिहीन बुद्धिहीन । आचारहीन विचारहीन ।
क्रियाहीन सत्वहीन । विवेकहीन संशई ॥ ३६ ॥

तो युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्त्वहीन, विवेकहीन, संशयी असतो. (३६)

भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।
शांतिहीन क्ष्माहीन । सर्वहीन क्षुल्लकु ॥ ३७ ॥

तो भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन सर्वच प्रकारे हीन, अगदी क्षुद्र, असा असतो. (३७)

समयो नेणे प्रसंग नेणे । प्रेत्न नेणे अभ्यास नेणे ।
आर्जव नेणे मैत्री नेणे । कांहींच नेणे अभागी ॥ ३८ ॥

त्यास वेळप्रसंग कळत नाही, प्रयत्न करणे जमत नाही, अभ्यास जमत नाही, आर्जवाने वागता येत नाही, कुणाशी मैत्री करता येत नाही, त्या अभाग्यास काहीच करणे जमत नाही. (३८)

असो ऐसे नाना विकार । कुलक्षणाचें कोठार ।
ऐसा कुविद्येचा नर । श्रोतीं वोळखावा ॥ ३९ ॥

असो, याप्रमाणे नाना विकार ज्याच्या ठिकाणी आहेत, जो कुलक्षणाचे जणू कोठारच आहे, तो कुविद्येचा नर आहे, असे श्रोत्यांनी ओळखावे. (३९)

ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि त्यागची करणें ।
अभिमानीं तर्ह्हें भरणें । हें विहित नव्हें ॥ ४० ॥

याप्रमाणे येथे कुविद्येची जी लक्षणे सांगितली आहेत, त्यांचा त्याग करावा हेच बरे ! अभिमानाने हट्टास पेटून ही वाईट लक्षणे न सोडण्याच्या भरीस पडणे योग्य नाही. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कुविद्यालक्षणनाम समास तिसरा ॥ ३ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कुविद्याक्षणनाम’ समास तिसरा समाप्त

समास चौथा : भक्तिनिरूपण

॥ श्रीराम ॥

नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ ।
त्याहिमधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥

अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ म्हणूनच केवळ नरदेहाची प्राप्ती होते. त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले तरच मनुष्य सन्मार्गास लागतो. (१)

नरदेहीं विशेष ब्राह्मण । त्याहीवरी संध्यास्नान ।
सद्वासना भगवद्भयजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥

नरदेहातही विशेषेकरून ब्राह्मण कुळात जन्म लाभणे, संध्यास्नान इत्यादी नित्यकर्मे व्यवस्थित करण्याची बुद्धी होणे व उत्तम वासना राहून हातून भगवद्‌भजन घडणे, हे सर्व पूर्वपुण्याईनेच होऊ शकते. (२)

भगवद्भनक्ति हे उत्तम । त्याहिवरी सत्समागम ।
काळ सार्थक हाचि परम । लाभ, जाणावा ॥ ३ ॥

भगवद्‌भक्ती करणे हे उत्तम आहेच. त्यांतही संतांचा सहवास लाभून काळ सार्थकी लागत असेल, तर हा फारच मोठा लाभ जाणावा. (३)

प्रेमप्रीतीचा सद्भा व । आणी भक्तांचा समुदाव ।
हरिकथा मोहोत्साव । तेणें प्रेमा दुणावे ॥ ४ ॥

हृदयांत भगवंताबद्दल विशुद्ध प्रेमभावना असेल व त्यात भगवद्‌भक्ताचा समुदाय जमून त्या महोत्सवात हरिकथाश्रवण घडले तर त्यायोगे भगवत्प्रेम दुणावते. (४)

नरदेहीं आलियां येक । कांही करावें सार्थक ।
जेणें पाविजे परलोक । परम दुल्लभ जो ॥ ५ ॥

नरदेह प्राप्त झाला असतां त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे परम दुर्लभ जो परलोक त्याची प्राप्ती होते. (५)

विधियुक्त ब्रह्मकर्म । अथवा दया दान धर्म ।
अथवा करणें सुगम । भजन भगवंताचें ॥ ६ ॥

त्यासाठी ब्रह्मकर्म विधियुक्त करावे अथवा दुसऱ्यावर दया करावी, दानधर्मादी करावे व सर्वांत सोपे साधन म्हणजे भगवंताचे भजन करावे. (६)

अनुतापें करावा त्याग । अथवा करणें भक्तियोग ।
नाहीं तरी धरणें संग । साधुजनाचा ॥ ७ ॥

पश्चात्तापाने संसाराचा त्याग करावा अथवा भक्तियोगाचे आचरण करावे. नाही तर निदान साधुपुरुषाच्या संगतीत राहावे. (७)

नाना शास्त्रें धांडोळावीं । अथवा तीर्थे तरी करावीं ।
अथवा पुरश्चरणें बरवीं । पापक्षयाकारणें ॥ ८ ॥

अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा कराव्या किंवा निदान पापक्षय व्हावा म्हणून उत्तम मंत्रांची पुरश्चरणे तरी करावीत. (८)

अथवा कीजे परोपकार । अथवा ज्ञानाचा विचार ।
निरूपणीं सारासार । विवेक करणें ॥ ९ ॥

अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानासंबंधी विचार करावा किंवा ऐकलेल्या निरूपणातून सारासार विवेक ग्रहण करावा. (९)

पाळावी वेदांची आज्ञा । कर्मकांड उपासना ।
जेणें हो‍इजे ज्ञाना- । आधिकारपात्र ॥ १० ॥

वेदांची आज्ञा पाळावी व ज्ञानाच्या अधिकारास पात्र होण्यासाठी कर्ममार्ग, उपासना यांचे व्यवस्थित आचरण करावे. (१०)

काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
कांहीं तरी येका भजनें । सार्थक करावें ॥ ११ ॥

काया, वाचा आणि मनाने, जी सामग्री प्राप्त होईल त्याने पाने, फुले फळे अथवा जल यांनी भगवंताचे पूजन, भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे. (११)

जन्मा आलियाचें फळ । कांहीं करावें सफळ ।
ऐसें न करितां निर्फळ । भूमिभार होये ॥ १२ ॥

नरजन्मास आल्यासारखे काही ना काही साधन करून तो जन्म सार्थकी लावावा. असे जर केले नाही, तर जन्म वाया जाऊन आपण केवळ पृथ्वीला भारभूत होऊन राहतो. (१२)

नरदेहाचे उचित । कांहीं करावें आत्महित ।
येथानुशक्त्या चित्तवित्त । सर्वोत्तमीं लावावें ॥ १३ ॥

नरदेहाचा यथोचित उपयोग करून आत्महित साधावे. आपापल्या कुवतीस अनुसरून आपले चित्त व वित्त त्या सर्वोत्तमाचे- भगवंताचे चरणी समर्पित करावे. (१३)

हें कांहींच न धरी जो मनीं । तो मृत्यप्राय वर्ते जनीं ।
जन्मा ये‍ऊन तेणें जननी । वायांच कष्टविली ॥ १४ ॥

यापैकी जो काहीच करीत नाही, तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखाच जाणावा. जन्मास येऊन त्याने आपल्या मातेला उगीचच कष्ट दिले असे म्हणावे लागते. (१४)

नाहीं संध्या नाहीं स्नान । नाहीं भजन देवतार्चन ।
नाहीं मंत्र जप ध्यान । मानसपूजा ॥ १५ ॥

अशी माणसे, स्नान, संध्या, भजन, देवतार्चन, मंत्रजप, ध्यान वा मानसपूजा काहीच करीत नाहीत. (१५)

नाहीं भक्ति नाहीं प्रेम । नाहीं निष्ठा नाहीं नेम ।
नाहीं देव नाहीं धर्म । अतीत अभ्यागत ॥ १६ ॥

ती भक्ती करीत नाहीत, भगवंतावर प्रेम करीत नाहीत, त्यांची कुठेही निष्ठा नसते. ती कुठलाही नेम पाळीत नाहीत, देव नाही, धर्म नाही, भोजनसमयी आलेल्या अतिथीचा सत्कार अन्नदान करीत नाहीत. (१६)

नाहीं सद्बुाद्धि नाहीं गुण । नाहीं कथा नाहीं श्रवण ।
नाहीं अध्यात्मनिरूपण । ऐकिलें कदां ॥ १७ ॥

त्यांच्या ठिकाणी सद्‌बुद्धी नसते, उत्तम गुण नसतात, ते कीर्तन, श्रवण, किंवा अध्यात्मनिरूपण यांपैकी काहीही करत नाहीत. (१७)

नाहीं भल्यांची संगती । नाहीं शुद्ध चित्तवृत्ती ।
नाहीं कैवल्याची प्राप्ती । मिथ्यामदें ॥ १८ ॥

ती सज्जनांची संगत करीत नाहीत, त्यांची चित्तशुद्धी होत नाही व मिथ्या मदामुळे त्यांना मोक्षाची प्राप्तीही नाही. (१८)

नाहीं नीति नाहीं न्याये । नाहीं पुण्याचा उपाये ।
नाहीं परत्रीची सोये । युक्तायुक्त क्रिया ॥ १९ ॥

ती न्यायाची चाड बाळगत नाहीत. पुण्यप्राप्तीसाठी प्रयत्‍न करीत नाहीत, युक्तायुक्त क्रियेसंबंधी विचारही करीत नाहीत व परलोकात उत्तम गती मिळावी, यासाठीही काही उपाय करीत नाहीत. (१९)

नाहीं विद्या नाहीं वैभव । नाहीं चातुर्याचा भाव ।
नाहीं कळा नाहीं लाघव । रम्यसरस्वतीचें ॥ २० ॥

विद्या, वैभव, चातुर्य, कला, किंवा सुंदर सरस्वतीचा वाग्विलास इत्यादी त्यांच्याजवळ काहीच नसते. (२०)

शांती नाहीं क्ष्मा नाहीं । दीक्षा नाहीं मैत्री नाहीं ।
शुभाशुभ कांहींच नाहीं । साधनादिक ॥ २१ ॥

शांती, क्षमा, दीक्षा म्हणजे एखादे व्रत, नेम पाळणे, सज्जनांशी मैत्री, इत्यादी शुभाशुभ साधनादिक त्यांच्यापाशी नसते. (२१)

सुचि नाहीं स्वधर्म नाहीं । आचार नाहीं विचार नाहीं ।
आरत्र नाहीं परत्र नाहीं । मुक्त क्रिया मनाची ॥ २२ ॥

पवित्रता, स्वधर्मविचार उत्तम आचार व विचार इहलोकीचे सार्थक करण्यासंबंधी किंवा परलोकातील गतिसंबंधी विचार ते करीत नाहीत. आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे ते अनिर्बंध रीतीने वागतात. (२२)

कर्म नाहीं उपासना नाहीं । ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं ।
योग नाहीं धारिष्ट नाहीं । कांहीच नाहीं पाहातां ॥ २३ ॥

त्यांच्या ठिकाणी कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धैर्य नाही; याप्रमाणे पाहू गेल्यास काहीच चांगले आढळून येत नाही. (२३)

उपरती नाहीं त्याग नाहीं । समता नाहीं लक्षण नाहीं ।
आदर नाहीं प्रीति नाहीं । परमेश्वराची ॥ २४ ॥

त्यांच्या ठिकाणी विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे, भगवंताविषयी आदर वा प्रीती या सर्वच गोष्टींचा अभाव असतो. (२४)

परगुणाचा संतोष नाहीं । परोपकारें सुख नाहीं ।
हरिभक्तीचा लेश नाहीं । अंतर्यामीं ॥ २५ ॥

लोकांचे गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही. परोपकाराचे सुख त्यांना माहीत नसते व अंतर्यामी हरिभक्तीचा लेशही नसतो. (२५)

ऐसे प्रकारीचे पाहातां जन । ते जीतचि प्रेतासमान ।
त्यांसीं न करावें भाषण । पवित्र जनीं ॥ २६ ॥

अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंत असून प्रेतासमान अपवित्र समजावेत व पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये. (२६)

पुण्यसामग्री पुरती । तयासीच घडें भगवद्भाक्ती ।
जें जें जैसें करिती । ते पावती तैसेंचि ॥ २७ ॥

जर पूर्वपुण्याचा संग्रह असेल, तर त्या पुण्यवान मनुष्याकडूनच भगवद्‌भक्ती घडते. ज्याचे पूर्व कर्म जसे असते, त्याप्रमाणेच त्यांना तसे फळ प्राप्त होत असते. (२७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भक्तिनिरूपणणनाम समास चवथा ॥ ४ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘ भक्तिनिरूपणनाम ‘ समास चौथा समाप्त.

समास पाचवा : रजोगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा ।
त्यामध्यें सत्त्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥

हा देह मुळात त्रिगुणांचा आहे. ते तीन गुण म्हणजे सत्त्व, रज व तमोगुण. त्यामध्ये उत्तम गुण म्हणजे सत्त्वगुण होय. (१)

सत्वगुणें भगवद्भवक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।
तमोगुणें अधोगती । पावति प्राणी ॥ २ ॥

सत्त्वगुणाने भगवद्‌भक्तीची प्राप्ती होते. रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते, तर तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते. (२)

श्लोक ॥ ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥

अर्थ- सत्त्वगुणप्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात. रजोगुणप्रधान माणसे मध्ये राहतात, तर तमोगुणप्रधान हीन वृत्तीची माणसे अधोगतीला जातात.

त्यांतहि शुद्ध आणी सबळ । तेहि बोलिजेति सकळ ।
शुद्ध तेंचि जें निर्मळ । सबळ बाधक जाणावें ॥ ३ ॥

गुणांमध्ये शुद्ध व शबल दोन प्रकारचा भेद आहे. शुद्ध ते निर्मळ असते तर शबल अशुद्ध असून बाधक असते. ते सर्व आता वर्णन करून सांगतो. (३)

शुद्धसबळाचें लक्षण । सावध परिसा विचक्षण ।
शुद्ध तो परमार्थी जाण । सबळ तो संसारिक ॥ ४ ॥

शुद्ध आणि शबल यांची वर्णने आता सांगतो ती सुज्ञांनी सावधपणे ऐकावी. शुद्ध गुण पारमार्थिक असतो तर शबल प्रापंचिक असतो. (४)

तयां संसारिकांची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती ।
येक येतां दोनी जाती । निघोनियां ॥ ५ ॥

त्या प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ते ऐका. त्याच्या देहात तिन्ही गुणांचे कार्य चालते. एकाचा जोर होतो, तेव्हा दुसरे दोन्ही क्षीण होतात. (५)

रज तम आणी सत्व । येणेंचि चाले जीवित्व ।
रजोगुणाचें कर्तृत्व । दाखऊं आता ॥ ६ ॥

रज, तम आणि सत्त्व या तीन गुणांच्या योगानेच जीवननिर्वाह होतो. त्यातील रजोगुणाचे कर्तृत्व येथे आता दाखवू या. (६)

रजोगुण येतां शरिरीं । वर्तणुक कैसी करी ।
सावध हो‍ऊनी चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥

शरीरात रजोगुण प्रबळ होतो, तेव्हा वर्तणूक कशी होते, ते चतुर लोकांनी सावध होऊन ऐकावे. (७)

माझें घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर ।
ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥

रजोगुण प्रबळ झाला की तो माणूस ”माझे घर माझा संसार येथे देव थोर म्हणून कुठला आणला ” असे निर्धारपूर्वक म्हणू लागतो. (८)

माता पिता आणी कांता । पुत्र सुना आणी दुहिता ।
इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगोण ॥ ९ ॥

तो आईवडील, बायको, मुले सुना, मुली इतक्यांचीच चिंता वाहतो. (९)

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
दुसर्याचें अभिळाषावें । तो रजोगोण ॥ १० ॥

रजोगुणी माणसाची वृत्ती बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे एवढेच नव्हे, तर दुसऱ्याच्या वस्तूंचीही अभिलाषा बाळगावी, अशा प्रकारची असते. (१०)

कैंचा धर्म कैंचें दान । कैंचा जप कैंचें ध्यान ।
विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥

कसला आला आहे धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान, असे म्हणून जो पापपुण्याचा विचार करीत नाही, तो रजोगुण होय. (११)

नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत ।
अनाचारीं मनोगत । तो रजोगोण ॥ १२ ॥

रजोगुण तीर्थ, व्रत, अतिथि-अभ्यागत तरजाणतच नाही उलट त्याची मनोवृत्ती अनाचाराकडे झुकणारी असते. (१२)

धनधान्याचे संचित । मन होये द्रव्यासक्त ।
अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगोण ॥ १३ ॥

ज्याच्या घरी धनधान्याचा भरपूर साठा असूनही ज्याचे मन द्रव्यासक्त असते व जो अत्यंत कंजूष असतो, तो रजोगुण होय. (१३)

मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर ।
मी सकळांमध्ये थोर- । म्हणे, तो रजोगुण ॥ १४ ॥

मी तरुण आहे, मी सुंदर आहे, मी बलाढ्य आहे, मी चतुर आहे. एवढेच नव्हे तर मीच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे म्हणतो, तो रजोगुण होय. (१४)

माझा देश माझा गांव । माझा वाडा माझा ठाव ।
ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगोण ॥ १५ ॥

हा माझा देश आहे, हा माझा गाव आहे, हा वाडा माझा आहे, हे माझे राहाण्याचे ठिकाण आहे, अशी मनात अत्यंत हाव जो बाळगतो, तो रजोगुण होय. (१५)

दुसर्या चें सर्व जावें । माझेचेंचि बरें असावें ।
ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगोण ॥ १६ ॥

दुसऱ्याचे सर्व जावे, पण माझे मात्र सर्व बरे असावे, असे स्वाभाविकपणे ज्याच्या मनास वाटते, तो रजोगुणच होय. (१६)

कपट आणी मत्सर । उठे देहीं तिरस्कार ।
अथवा कामाचा विकार । तो रजोगोण ॥ १७ ॥

जो कपटी आणि मत्सरी असून दुसऱ्याचा तिरस्कार करतो व ज्याच्या ठिकाणी कामविकार प्रबळ असतो, तो रजोगुण जाणावा. (१७)

बाळकावरी ममताअ । प्रीतीनें आवडे कांता ।
लोभ वाटे समस्तां । तो रजोगोण ॥ १८ ॥

ज्याची मुलांवर ममता असते, बायकोवर ज्याचे फार प्रेम असते व सर्वांविषयी ज्यास लोभ असतो, तो रजोगुण होय. (१८)

जिवलगांची खंती । जेणें काळें वाटे चित्तीं ।
तेणें काळें सीघ्रगती । रजोगुण आला ॥ १९ ॥

ज्या वेळी निकटच्या आप्तस्वकीयांविषयी अत्यंत काळजी वाटू लागते, त्या वेळी रजोगुण प्रबळ झाला आहे, असे समजावे. (१९)

संसाराचे बहुत कष्ट । कैसा हो‍ईल सेवट ।
मनास आठवे संकट । तो रजोगोण ॥ २० ॥

संसारात इतके कष्ट आहेत, आता शेवट कसा होतो कुणास ठाऊक, असे ज्याच्या मनास संकट वाटते, तो रजोगुणच होय. (२०)

कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें ।
दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगोण ॥ २१ ॥

किंवा पूर्वी जे जे काही भोगावे लागले, त्याची मनात आठवण येऊन ज्याला अत्यंत दुःख होते, तो रजोगुणच होय. (२१)

वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटीं ।
आशागुणें हिंपुटी- । करी, तो रजोगुण ॥ २२ ॥

दुसर्‍याचे वैभव दृष्टीस पडल्यावर ज्याला आपल्यालाही तसे प्राप्त व्हावे अशी आवड उत्पन्न होते आणि त्या आशेच्या योगाने जो कष्टी होतो, तो रजोगुण जाणावा. (२२)

जें जें दृष्टी पडिलें । तें तें मनें मागितलें ।
लभ्य नस्तां दुःख जालें । तो रजोगोण ॥ २३ ॥

जे जे दृष्टीस पडते, ते ते लगेच मनाला हवेसे वाटते, पण ते मिळण्यासारखे नसेल तर ज्यायोगे दुःख होते, तो रजोगुण जाणावा. (२३)

विनोदार्थीं भरे मन । शृंघारिक करी गायेन ।
राग रंग तान मान । तो रजोगोण ॥ २४ ॥

ज्याचे मन हास्यविनोदाच्या योगे प्रसन्न होते, जो शृंगारिक गाणी गातो, ज्याला राग, रंग, तान, मान यात रस असतो, तो रजोगुण. (२४)

टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे वेवादा ।
हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगोण ॥ २५ ॥

व्यंगोक्ती, थट्टामस्करी, निंदा करणे व वादविवाद करणे ज्याला आवडते, जो सर्वदा हास्यविनोद करीत असतो, तो रजोगुणच. (२५)

आळस उठे प्रबळ । कर्मणुकेचा नाना खेळ ।
कां उपभोगाचे गोंधळ । तो रजोगोण ॥ २६ ॥

ज्याच्या ठिकाणी अत्यंत आळस असतो, जो करमणुकीसाठी नाना प्रकारचे खेळ खेळतो व जेथे व्यसनांचा गोंधळ चालू असतो, तो रजोगुण जाणावा. (२६)

कळावंत बहुरूपी । नटावलोकी साक्षेपी ।
नाना खेळी दान अर्पी । तो रजोगोण ॥ २७ ॥

जो कलावंत असतो, बहुरूप्याप्रमाणे नाना सोंगे घेतो, नाटकाचा जो शौकीन असतो, नाना प्रकारच्या खेळांवर जो पैसे घालवतो, तो रजोगुण जाणावा. (२७)

उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती । ग्रामज्य आठवे चित्तीं ।
आवडे नीचाची संगती । तो रजोगुण ॥ २८ ॥

मादक किंवा धुंदी, नशा आणणल्या द्रव्याची ज्यास अत्यंत आवड असते, विषयासक्ती व गुंडपणा याचेच जो चिंतन करतो व ज्याला नीच लोकांची संगती आवडते, तो रजोगुण जाणावा. (२८)

तश्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे ।
नित्यनेमास मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥

ज्याला चोरीची विद्या शिकावी असे वाटते, लोकांचे दोष, कमीपणा बोलून दाखवणे आवडते, नित्यनेमाला ज्याचे मन विटते, तो रजोगुण होय. (२९)

देवकारणीं लाजाळु । उदरालागीं कष्टाळु ।
प्रपंची जो स्नेहाळु । तो रजोगुण ॥ ३० ॥

देवाचे कार्य करण्याची ज्याला लाज वाटते जो पोटासाठी वाटेल तितके कष्ट उपसण्यास तयार असतो आणि प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते, तो रजोगुण. (३०)

गोडग्रासीं आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण ।
रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥

ज्याला गोडधोड पदार्थांची आसक्ती असते, अत्यंत आदराने जो देहाचे पोषण करतो आणि ज्यास उपास करणे आवडत नाही, तो माणूस रजोगुणी जाणावा. (३१)

शृंगारिक तें आवडे । भक्ती वैराग्य नावडे ।
कळालाघवीं पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥

ज्यास शृंगारिक गोष्टींची आवड असते, भक्ती, वैराग्य वगैरे मुळीच आवडत नाही व जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यात प्रवीण असतो, तो रजोगुण. (३२)

नेणोनियां परमात्मा । सकळ पदार्थी प्रेमा ।
बळात्कारें घाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥

परमात्म्यास जो जाणत नाही आणि त्यामुळे जो सर्व दृश्य पदार्थावरच खरे प्रेम करीत असतो, त्यामुळे ज्यास पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, तो रजोगुण. (३३)

असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण ।
प्रपंची तो सबळ जाण । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥

याप्रमाणे हा रजोगुण आसक्तीमुळे वारंवार जन्ममरण भोगायला लावतो व प्रपंचांतही त्याच्या प्राबल्यामुळे दारुण दुःख भोगावे लागते. (३४)

आतां रजोगुण हा सुटेना । संसारिक हें तुटेना ।
प्रपंचीं गुंतली वासना । यास उपाय कोण ॥ ३५ ॥

आता हा रजोगुण तर सुटता सुटत नाही, त्यामुळे या संसारचक्रातून सुटका होत नाही. वासना प्रपंचातच गुंतून राहते, तरी यावर उपाय काय? (३५)

उपाये येक भगवद्भवक्ती । जरी ठाकेना विरक्ती ।
तरी येथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥

त्यावर श्री समर्थ म्हणतात की, यावर भगवद्‌भक्ती हा एकच उपाय आहे. आपल्या ठिकाणी जरी वैराग्य नसले तरी यथाशक्ती भगवद्‌भजन करावे. (३६)

काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
ईश्वरीं अर्पूनियां मनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥

काया, वाचा आणि मनाने, पत्र, पुष्प, फळ अथवा पाणी जे काही उपलब्ध असेल, ते मनाने ईश्वरास अर्पण करून जीवनाचे सार्थक करावे. (३७)

येथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंतीं अनन्य ।
सुखदुःखें परी चिंतन । देवाचेंचि करावें ॥ ३८ ॥

यथाशक्ती दान, पुण्य करीत जावे व कुठल्याही परिस्थितीत, सुखात अथवा दुःखात चिंतन देवाचेच करावे. भगवंतालाच सदैव अनन्य शरण असावे. (३८)

आदि‍अंती येक देव । मध्येंचि लाविली माव ।
म्हणोनियां पूर्ण भाव । भगवंतीं असावा ॥ ३९ ॥

या विश्वाच्या आदी व अंती एक देवच आहे. मध्ये उगीचच ही माया भुलवते. म्हणून पूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणीच असावा. (३९)

ऐसा सबळ रजोगुण । संक्षेपें केलें कथन ।
आतां शुद्ध तो तूं जाण । परमार्थिक ॥ ४० ॥

शबल रजोगुण हा असा आहे. त्याचे येथे थोडक्यात वर्णन केले आहे. आता शुद्ध रजोगुण जो पारमार्थिक असतो, तोही तू जाणून घे. (४०)

त्याचे वोळखीचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण ।
तो रजोगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥

सत्त्वगुणाच्या वर्णनांतच त्याच्या ओळखीची चिन्हे सापडतात. तो शुद्ध रजोगुणच भजनाचे मूळ आहे. म्हणून तो पूर्णतः जाणून घ्यावा. (४१)

ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुमानिला ।
आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥

याप्रमाणे येथे रजोगुणाचे वर्णन केले आहे, ते श्रोत्यांनी अनुमानाने जाणून घेतले असेलच. आता पुढे तमोगुणाचे वर्णन केले आहे. तेही श्रवण करावे. (४२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
रजोगुणलक्षणनाम समास पांचवा ॥ ५ ॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘रजोगुणलक्षणनाम’ समास पाचवा समाप्त

समास सहावा : तमोगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण ।
आतां ऐका तमोगुण । तोहि सांगिजेल ॥ १ ॥

श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले आहे. आता तमोगुणाचे वर्णन करतो, तेही ऐका. (१)

संसारीं दुःखसंमंध । प्राप्त होतां उठे खेद ।
कां अद्भुुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ २ ॥

प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला असता जो अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो, तो तमोगुण समजावा. (२)

शेरीरीं क्रोध भरतां । नोळखे माता पिता ।
बंधु बहिण कांता । ताडी, तो तमोगुण ॥ ३ ॥

जेव्हा शरीरात क्रोधाचा संचार होतो, तेव्हा तो आईवडिलांनाही ओळखत नाही. एवढेच नव्हे तर भाऊ, बहीण, बायको यांनाही मारू लागतो, तो तमोगुण होय. (३)

दुसर्यामचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा ।
विसरवी जीवभावा । तो तमोगुण ॥ ४ ॥

दुसऱ्याचा प्राण घ्यावा, किंवा आपला स्वतःचा जीव घ्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो, तेव्हा तो तमोगुण. (४)

भरलें क्रोधाचें काविरें । पिश्याच्यापरी वावरे ।
नाना उपायें नावरे । तो तमोगुण ॥ ५ ॥

ज्या वेळी क्रोधाचा आवेग येतो, तेव्हा जणू शरीरात पिशाच्याचा संचार झाल्यासारखा जो वागतो व नाना उपाय करूनही जो आवरत नाही तो तमोगुण. (५)

आपला आपण शस्त्रपात । पराचा करी घात ।
ऐसा समय वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥

प्रसंगी आपण आपल्यालाच शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्याचा घात करावा असे वाटणे, हा तमोगुणच होय. (६)

डोळा युध्यचि पाहवें । रण पडिलें तेथें जावें ।
ऐसें घेतलें जीवें । तो तमोगुण ॥ ७ ॥

जेव्हा डोळ्यांनी युद्धच पाहावे असे वाटते, जेथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते, तो तमोगुणच असतो. (७)

अखंड भ्रांती पडे । केला निश्चय विघडे ।
अत्यंत निद्रा आवडे । तो तमोगुण ॥ ८ ॥

ज्याच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो, एखादा निश्चय केला तर तो टिकत नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते तो तमोगुण होय. (८)

क्षुधा जयाची वाड । नेणे कडु अथवा गोड ।
अत्यंत जो कां मूढ । तो तमोगुण ॥ ९ ॥

ज्याची भूक अनावर असल्याने जो कडू गोड इत्यादी जाणतच नाही, असा जो अत्यंत मूढ असतो, तो तमोगुण. (९)

प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें ।
स्वयें आत्महत्या करणें । तो तमोगुण ॥ १० ॥

आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो स्वतः जीव देण्यास, प्रवृत्त होतो, तो तमोगुण होय. (१०)

किडा मुंगी आणी स्वापद । यांचा करूं आवडे वध ।
अत्यंत जो कृपामंद । तो तमोगुण ॥ ११ ॥

ज्याला किडा, मुंगी, श्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते, ज्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो तो तमोगुण होय. (११)

स्त्रीहत्या बाळहत्या । द्रव्यालागीं ब्रह्मत्या ।
करूं आवडे गोहत्या । तो तमोगुण ॥ १२ ॥

ज्याला स्त्रीहत्या, बालहत्या, एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रह्महत्या, गोहत्यादी करणे आवडते तो तमोगुण जाणावा. (१२)

विसळाचेनि नेटें । वीष घ्यावेंसें वाटे ।
परवध मनीं उठे । तो तमोगुण ॥ १३ ॥

नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व जो दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा करतो, तो तमोगुण होय. (१३)

अंतरीं धरूनि कपट । पराचें करी तळपट ।
सदा मस्त सदा उद्धट । तो तमोगुण ॥ १४ ॥

जो मनात कपट धरून दुसऱ्याचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो, जो सदा मस्त आणि उद्धट असतो, तो तमोगुण समजावा. (१४)

कळह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी ऐसें उठे ।
अन्तरी द्वेष प्रगटे । तो तमोगुण ॥ १५ ॥

कुणाशी तरी भांडावे, कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्याबद्दल द्वेष प्रगट होणे, हे तमोगुणाचे कार्य होय. (१५)

युध्य देखावें ऐकावें । स्वयें युध्यचि करावें ।
मारावें कीं मरावें । तो तमोगुण ॥ १६ ॥

युद्ध डोळ्यांनी पाहावे, कानांनी युद्धाच्या वार्ता ऐकाव्या, एवढेच नव्हे, तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे हा तमोगुणच. (१६)

मत्सरें भक्ति मोडावी । देवाळयें विघडावीं ।
फळतीं झाडें तोडावीं । तो तमोगुण ॥ १७ ॥

जो कुणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी, देवालये पाडावी, फळे येणारी झाडे तोडून टाकावी, असे ज्यास वाटते तो तमोगुण होय. (१७)

सत्कर्में ते नावडती । नाना दोष ते आवडती ।
पापभय नाहीं चित्ती । तो तमोगुण ॥ १८ ॥

ज्याला सत्कर्मे आवडत नाहीत तर नाना दोषच आवडतात व ज्याच्या चित्तात पापाचे भय जराही नसते, तो तमोगुण होय. (१८)

ब्रह्मवृत्तीचा उछेद । जीवमात्रास देणें खेद ।
करूं आवडे अप्रमाद । तो तमोगुण ॥ १९ ॥

ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे ज्यास आवडते, जीवमात्रास दुःख देणे व अती पाप करणेच ज्याला आवडते, तो तमोगुण जाणावा. (१९)

आग्नप्रळये शस्त्रप्रळये । भूतप्रळये वीषप्रळये ।
मत्सरें करीं जीवक्षये । तो तमोगुण ॥ २० ॥

जो आगी लावतो, शस्त्रांनी लोकांचा घात करतो, जो भूतप्रेतबाधा करून लोकांना छळतो, लोकांना विष घालतो, मत्सराने लोकांचा जीवही घेतो, तो तमोगुण होय. (२०)

परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास ।
संसाराचा नये त्रास । तो तमोगुण ॥ २१ ॥

लोकांना पीडा देण्यात ज्याला संतोष वाटतो, निष्ठुरपणाचा जो हव्यास धरतो आणि संसारासाठी कष्ट करण्यास जो त्रासत नाही, तो तमोगुणच जाणावा. (२१)

भांडण लाऊन द्यावें । स्वयें कौतुक पाहावें ।
कुबुद्धि घेतली जीवें । तो तमोगुण ॥ २२ ॥

लोकांमध्ये भांडण लावून द्यावे व स्वतः ती मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते, तो तमोगुणच होय. (२२)

प्राप्त जालियां संपत्ती । जीवांस करी यातायाती ।
कळवळा नये चित्तीं । तो तमोगुण ॥ २३ ॥

स्वतःस संपत्ती प्राप्त झाली असताही जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो, ज्याला अंतःकरणात थोडाही कळवळा येत नाही तो तमोगुणच. (२३)

नावडे भक्ति नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव ।
वेदशास्त्र नलगे सर्व । तो तमोगुण ॥ २४ ॥

ज्यास भक्ती आवडत नाही, भाव आवडत नाही, तीर्थयात्रा व देवही आवडत नाही व वेदशास्त्रादी ज्यास नकोसे वाटते, तो तमोगुणच होय. (२४)

स्नानसंध्या नेम नसे । स्वधर्मीं भ्रष्टला दिसे ।
अकर्तव्य करीतसे । तो तमोगुण ॥ २५ ॥

जो स्नानसंध्यादी कुठलाही नेम करीत नाही; स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला दिसतो आणि जे करू नये तेच जो करतो, तो तमोगुण समजावा. (२५)

जेष्ठ बंधु बाप माये । त्यांचीं वचनें न साहे ।
सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ॥ २६ ॥

मोठा भाऊ, आईवडील यांचे बोलणे ज्यास सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्रकोपी घरच सोडून निघून जातो, तो तमोगुण होय. (२६)

उगेंचि खावें उगेंचि असावें । स्तब्ध हो‍ऊन बैसावें ।
कांहींच स्मरेना स्वभावें । तो तमोगुण ॥ २७ ॥

उगीचच खावे, काहीच न करता बसून राहावे, ज्याला स्वाभाविकरीत्याच काहीच स्मरत नाही, तो तमोगुण जाणावा. (२७)

चेटकविद्येचा अभ्यास । शस्त्रविद्येचा हव्यास ।
मल्लविद्या व्हावी ज्यास । तो तमोगुण ॥ २८ ॥

जारणमारणादी चेटकविद्येचा जो अभ्यास करतो, शस्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मल्लविद्या यावी अशी जो इच्छा धरतो, तो तमोगुण होय. (२८)

केले गळाचे नवस । रडिबेडीचे सायास ।
काष्ठयंत्र छेदी जिव्हेस । तो तमोगुण ॥ २९ ॥

जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे, किंवा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा काष्ठयंत्राने जीभ कापून घेण्याचे नवस करतो, तो तमोगुण. (२९)

मस्तकीं भदें जाळावें । पोतें आंग हुरपळावें ।
स्वयें शस्त्र टोचून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३० ॥

मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याचे तप्त खापर जाळावे, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतःस शस्त्र टोचून घ्यावे, हा तमोगुणच जाणावा. (३०)

देवास सिर वाहावें । कां तें आंग समर्पावें ।
पडणीवरून घालून घ्यावे । तो तमोगुण ॥ ३१ ॥

आपले मस्तक देवास वाहावे, किंवा एखादा अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून द्यावे, हे सर्व तमोगुणाचे कार्य होय. (३१)

निग्रह करून धरणें । कां तें टांगून घेणें ।
देवद्वारीं जीव देणें । तो तमोगुण ॥ ३२ ॥

जो देवाच्या दारी निग्रहाने, हट्टाने धरणे धरतो, किंवा स्वतःस टांगून घेतो, किंवा देवद्वारी जीव देतो, तो तमोगुण जाणावा. (३२)

निराहार उपोषण । पंचाग्नी धूम्रपान ।
आपणास घ्यावें पुरून । तो तमोगुण ॥ ३३ ॥

जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करतो, अथवा पंचाग्निसाधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून व डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो, अथवा धूम्रपानाचे साधन करतो, किंवा स्वतःस पुरून घेतो, तो तमोगुणच होय. (३३)

सकाम जें का अनुष्ठान । कां तें वायोनिरोधन ।
अथवा राहावें पडोन । तो तमोगुण ॥ ३४ ॥

काही कामना धरून जो अनुष्ठान करतो, किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो, तो तमोगुण जाणावा. (३४)

नखें केश वाढवावे । हस्तचि वर्ते करावे ।
अथवा वाग्सुंन्य व्हावें । तो तमोगुण ॥ ३५ ॥

जो नखे, केस वाढवतो, हात वर करून उभा राहातो किंवा जो एकदम मौनच राहातो, तो तमोगुणच होय. (३५)

नाना निग्रहें पिडावें । देहदुःखें चर्फडावें ।
क्रोधें देवांस फोडावें । तो तमोगुण ॥ ३६ ॥

नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यावयाची आणि देहास दुःख झाले की चरफडायचे व रागारागाने देवालाच फोडायचे, हे तमोगुणाचे कार्य असते. (३६)

देवाची जो निंदा करी । तो आशाबद्धि अघोरी ।
जो संतसंग न धरी । तो तमोगुण ॥ ३७ ॥

जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही करीत नाही, तो तमोगुण होय. (३७)

ऐसा हा तमोगुण । सांगतां जो असाधारण ।
परी त्यागार्थ निरूपण । कांहीं येक ॥ ३८ ॥

तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे, पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन येथे केले आहे. (३८)

ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनास कारण ।
मोक्षप्राप्तीचें लक्षण । नव्हे येणें ॥ ३९ ॥

वर सांगितल्याप्रमाणे जे वर्तन असते, तो तमोगुण होय; पण हा अधोगतीसच कारण होतो. याच्यायोगे मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. (३९)

केल्या कर्माचें फळ । प्राप्त हो‍ईल सकळ ।
जन्म दुःखाचें मूळ । तुटेना कीं ॥ ४० ॥

माणूस जसे कर्म करतो, त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावे लागते. तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म त्यातून सुटका होत नाही. (४०)

व्हावया जन्माचें खंडण । पाहिजे तो सत्वगुण ।
तेंचि असे निरुपण । पुढिले समासीं ॥ ४१ ॥

जन्मच नको असेल तर त्याचे खंडण होण्याकरिता सत्त्वगुण आवश्यक आहे. म्हणून पुढील समासात त्या सत्त्वगुणाचेच निरूपण केले आहे. (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
तमोगुणलक्षणनाम समास सहावा ॥ ६ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘तमोगुणलक्षणनाम’ समास सहावा समाप्त.

समास सातवा : सत्त्वगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण ।
आतां ऐका सत्वगुण । परम दुल्लभ ॥ १ ॥

श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात अत्यंत दारुण दुःख देणारा जो तमोगुण त्याचे वर्णन केले. आता परम दुर्लभ अशा सत्त्वगुणाचे वर्णन ऐकावे. (१)

जो भजनाचा आधार । जो योगियांची थार ।
जो निरसी संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥

भजनाला म्हणजेच भगवद्‌भक्तीला सत्त्वगुणाचा आधार असतो. योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवतात आणि सत्त्वगुणामुळे दुःखमूळ जो संसार त्याचे निरसन होते. (२)

जेणें होये उत्तम गती । मार्ग फुटे भगवंतीं ।
जेणें पाविजे मुक्ती । सायोज्यता ते ॥ ३ ॥

उत्तम गती सत्त्वगुणामुळेच प्राप्त होते व भगवद्‌भक्तीचा मार्ग सापडून सायुज्यता मुक्तीही प्राप्त होते. (३)

जो भक्तांचा कोंवसा । जो भवार्णवींचा भर्वसा ।
मोक्षलक्ष्मीची दशा । तो सत्वगुण ॥ ४ ॥

सत्त्वगुण हा भक्तांची कणव करणारा त्यांचा सखा आहे. तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाचा मदतनीस आहे. मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजे सत्त्वगुणच होय. (४)

जो परमार्थाचें मंडण । जो महंतांचें भूषण ।
रजतमाचें निर्शन । तो सत्वगुण ॥ ५ ॥

सत्त्वगुण परमार्थाची शोभा आहे, संत-महंतांचे ते भूषण आहे आणि रजोगुण व तमोगुणांचे निरसन सत्त्वगुणामुळेच होतो. (५)

जो परमसुखकारी । जो आनंदाची लहरी ।
दे‍ऊनियां, निवारी- । जन्ममृत्य ॥ ६ ॥

सत्त्वगुण परम सुख देणारा असून तो स्वात्मसुखाचा अनुभव देऊन जन्ममृत्यूचे निवारण करतो. (६)

जो अज्ञानाचा सेवट । जो पुण्याचें मूळ पीठ ।
जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥

सत्त्वगुणामुळेच अज्ञानाचा नाश होतो. पुण्याचा मूळ आधार सत्त्वगुणच आहे व त्यामुळे परलोकाची वाट सापडते. (७)

ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण ।
तये क्रियेचें लक्षण । ऐसें असे ॥ ८ ॥

असा हा सत्त्वगुण देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रगट होतो, तेव्हा आचरणात जो बदल घडून येतो, त्या क्रियेचे लक्षण असे असते. (८)

ईश्वरीं प्रेमा अधिक । प्रपंच संपादणे लोकिक ।
सदा सन्निध विवेक । तो सत्वगुण ॥ ९ ॥

परमेश्वराविषयी अधिक प्रेम उत्पन्न होते, प्रपंच चारचौघांसारखा लौकिकरीत्या केला जातो आणि सदा सर्वकाळ अंतःकरणात विवेक जागृत राहतो, हे सत्त्वगुणाचे लक्षण होय. (९)

संसारदुःख विसरवी । भक्तिमार्ग विमळ दावी ।
भजनक्रिया उपजवी । तो सत्वगुण ॥ १० ॥

सत्त्वगुणामुळे संसारदुःखाचा विसर पडतो, निर्मळ अशा भक्तिमार्गाचे ज्ञान होते व भजनाची आवड उत्पन्न होते. (१०)

परमार्थाची आवडी । उठे भावार्थाची गोडी ।
परोपकारीं तांतडी । तो सत्वगुण ॥ ११ ॥

परमार्थाची आवड उत्पन होऊन परमात्म्याविषयी भावभक्ती वाढू लागते व परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते. (११)

स्नानसंध्या पुण्यसीळ । अभ्यांतरींचा निर्मळ ।
शरीर वस्त्रें सोज्वळ । तो सत्वगुण ॥ १२ ॥

स्नानसंध्यादी आचार आवडणे, शरीर व वस्त्रे यांची निर्मलता ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत. (१२)

येजन आणी याजन । आधेन आणी अध्यापन ।
स्वयें करी दानपुण्य । तो सत्वगुण ॥ १३ ॥

यज्ञयाग करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन करणे व दान व पुण्यकर्मे करणे हे सत्त्वगुणच करवितो. (१३)

निरूपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी ।
क्रिया पालटे रोकडी । तो सत्वगुण ॥ १४ ॥

जेथे वेदान्त- निरूपणाची आवड असते, हरिकथेत गोडी वाटते व आचरणात तत्काळ चांगला बदल होतो तो सत्त्वगुण जाणावा. (१४)

अश्वदानें गजदानें । गोदानें भूमिदानें ।
नाना रत्नांचीं दानें- । करी, तो सत्वगुण ॥ १५ ॥

अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात, तो सत्त्वगुण होय. (१५)

धनदान वस्त्रदान । अन्नदान उदकदान ।
करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६ ॥

संपत्तीचे दान, वस्त्राचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मणसंतर्पण ही कार्ये सत्त्वगुणाची आहेत. (१६)

कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें ।
निःकाम तीर्थें उपोषणे । तो सत्वगुण ॥ १७ ॥

कार्तिकस्‍नाने, माघसस्‍नाने, निरनिराळी व्रते, त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा व उपोषणे असतील, तेथे सत्त्वगुण जाणावा. (१७)

सहस्रभोजनें लक्षभोजनें । विविध प्रकारींचीं दानें ।
निःकाम करी सत्वगुणें । कामना रजोगुण ॥ १८ ॥

सहस्रभोजने, लक्षभोजने, विविध प्रकारची दाने इत्यादी जेथे निष्काम बुद्धीने घडते, तो सत्त्वगुण होय. सकामता ही रजोगुणामुळे उत्पन्न होते. (१८)

तीर्थीं अर्पी जो अग्रारें । बांधे वापी सरोवरें ।
बांधे देवाळयें सिखरें । तो सत्वगुण ॥ १९ ॥

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे, विहिरी बांधणे, देवळे व देवळांची शिखरे बांधणे हा सत्त्वगुण होय. (१९)

देवद्वारीं पडशाळा । पाईरीया दीपमाळा ।
वृंदावनें पार पिंपळा- । बांधे, तो सत्वगुण ॥ २० ॥

देवद्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या व दीपमाळा बांधणे, तुळशी वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्त्वगुणच आहे. (२०)

लावीं वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें ।
निववी तापस्यांचीं मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥

वने, उपवने, पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे, हे सत्त्वगुणाचे कार्य आहे. (२१)

संध्यामठ आणि भुयेरीं । पाईरीया नदीतीरीं ।
भांडारगृहें देवद्वारीं । बांधें, तो सत्वगुण ॥ २२ ।

संध्यामठ व ध्यानासाठी गुहा बांधणे, नदीतीरी घाट बांधणे अथवा देवद्वारी भांडारगृह बांधणे हे असेल तेथे सत्त्वगुण जाणावा. (२२)

नाना देवांचीं जे स्थानें । तेथें नंदादीप घालणें ।
वाहे आळंकार भूषणें । तो सत्वगुण ॥ २३ ॥

निरनिराळ्या देवस्थानांच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे, हा सत्त्वगुण होय. (२३)

जेंगट मृदांग टाळ । दमामे नगारे काहळ ।
नाना वाद्यांचे कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥

झेंगट, मृदुंग, टाळ दमामा, नगारे ,काहळ वगैरे सुस्वर वाद्यादिकांचा कल्लोळ जेथे असेल तो सत्त्वगुण होय. (२४)

नाना समग्री सुंदर । देवाळईं घाली नर ।
हरिभजनीं जो तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥

अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवालयाला अर्पण करतो, आणि जो हरिभजनी तत्पर असतो, तो सत्त्वगुण होय. (२५)

छेत्रें आणी सुखासनें । दिंड्या पताका निशाणें ।
वाहे चामरें सूर्यापानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥

छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज (निशाणे), चामर अबदागिरी वगैरे जो देवास वाहतो, तो सत्त्वगुण होय. (२६)

वृंदावनें तुळसीवने । रंगमाळा संमार्जनें ।
ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण ॥ २७ ॥

वृंदावने, तुळसीवने, सडासंमार्जन, रांगोळ्या यांची अंतःकरणात आवड उत्पन्न होते, तो सत्त्वगुण होय. (२७)

सुंदरें नाना उपकर्णें । मंडप चांदवे आसनें ।
देवाळईं समर्पणें । तो सत्वगुण ॥ २८ ॥

नाना सुंदर उपकरणी, मंडप, चांदवे, आसने देवालयाला समर्पण करणे हा सत्त्वगुणच आहे. (२८)

देवाकारणें खाद्य । नाना प्रकारीं नैवेद्य ।
अपूर्व फळें अर्पी सद्य । तो सत्वगुण ॥ २९ ॥

देवासाठी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, नाना प्रकारचे नैवेद्य, उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो, तो सत्त्वगुण होय. (२९)

ऐसी भक्तीची आवडी । नीच दास्यत्वाची गोडी ।
स्वयें देवद्वार झाडी । तो सत्वगुण ॥ ३० ॥

अशी भक्तीची अत्यंत आवड जेथे असते, देवाचे हलक्यातील हलके काम करण्यातही जिथे गोडी वाटते व स्वतः देवद्वार झाडतो, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३०)

तिथी पर्व मोहोत्साव । तेथें ज्याचा अंतर्भाव ।
काया वाचा मनें सर्व- । अर्पी, तो सत्वगुण ॥ ३१ ॥

निरनिराळ्या तिथींना, पर्वकाळी व महोत्सवात जो सहभागी होतो व काया-वाचा-मनाने जो सर्व ईश्वरास अर्पण करतो, तो सत्त्वगुणच होय. (३१)

हरिकथेसी तत्पर । गंधें माळा आणी धुशर ।
घे‍ऊन उभीं निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥

जे लोक हरिकथेस तत्पर असतात व गंध, माळ बुक्का इत्यादी घेऊन देवद्वारी उभे असतात, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३२)

नर अथवा नारी । येथानुशक्ति सामग्री ।
घे‍ऊन उभीं देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३३ ॥

स्त्रिया अथवा पुरुष शक्तीस अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवद्वारी उभी असतात, तो सत्त्वगुणच होय. (३३)

महत्कृत्य सांडून मागें । देवास ये लागवेगें ।
भक्ति निकट आंतरंगें । तो सत्वगुण ॥ ३४ ॥

जो महत्त्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो व ज्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयी जवळीक असून भक्तिभाव असतो, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३४)

थोरपण सांडून दुरी । नीच कृत्य आंगीकारी ।
तिष्ठत उभा देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३५ ॥

जो अभिमान सोडून देऊन हलक्यात हलकी सेवाही स्वीकारतो व सदा देवद्वारात तिष्ठत उभा असतो तो सत्त्वगुण होय. (३५)

देवालागीं उपोषण । वर्जी तांबोल भोजन ।
नित्य नेम जप ध्यान- । करी, तो सत्वगुण ॥ ३६ ॥

जो भगवंताच्या कृपेसाठी उपोषण करतो व भोजन, तांबूल इत्यादी भोगसामग्रीचा त्याग करून नित्यनेमाने जपध्यानादी करतो, तो सत्त्वगुणच असतो. (३६)

शब्द कठीण न बोले । अतिनेमेसी चाले ।
योगू जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥ ३७ ॥

जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो व जो योगी लोकांना संतोष देतो, तो सत्त्वगुणच जाणावा. (३७)

सांडूनिया अभिमान । निःकाम करी कीर्तन ।
श्वेद रोमांच स्फुराण । तो सत्वगुण ॥ ३८ ॥

जो अभिमान सोडून निष्काम भावनेने कीर्तन करतो व त्या प्रसंगी स्वेद, रोमांच, स्फुरण इत्यादी अष्ट सात्त्विकभाव जेथे प्रगट होतात, तो सत्त्वगुण होय. (३८)

अंतरीं देवाचें ध्यान । तेणें निडारले नयन ।
पडे देहाचें विस्मरण । तो सत्वगुण ॥ ३९ ॥

ज्याच्या अंतरी सदा देवाचे ध्यान लागलेले असते व भक्तिभावामुळे ज्याचे डोळे पाण्याने भरून येतात व जो देहाचे भानही विसरतो, तो सत्त्वगुणच जाणावा. (३९)

हरिकथेची अति प्रीति । सर्वथा नये विकृती ।
आदिक प्रेमा आदि‍अंतीं । तो सत्वगुण ॥ ४० ॥

ज्यास हरिकथेची अत्यंत प्रीती असते व कधी चुकूनही कंटाळा येत नाही, उलट सुरुवातीस व शेवटीही अधिकच प्रेम दिसून येते, तो सत्त्वगुणच असतो. (४०)

मुखीं नाम हातीं टाळी । नाचत बोले ब्रीदावळी ।
घे‍ऊन लावी पायधुळी । तो सत्वगुण ॥ ४१ ॥

जो मुखाने भगवंताचे नाव उच्चारत, हाताने टाळ्या वाजवत, आनंदाने नाचत नाचत भगवंताचे गुणानुवाद व ब्रीदावळी गातो, तसेच भगवद्‌भक्तांची पायधूळ आपल्या मस्तकी धारण करतो, तो सत्त्वगुण होय. (४१)

देहाभिमान गळे । विषईं वैराग्य प्रबळे ।
मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥

ज्यायोगे देहाभिमान नष्ट होतो, विषयासंबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या हे कळू लागते, तो सत्त्वगुण जाणावा. (४२)

कांहीं करावा उपाये । संसारीं गुंतोन काये ।
उकलवी ऐसें हृदये । तो सत्वगुण ॥ ४३ ॥

या भवसागरातून तरून जाण्याचा काही तरी उपाय करावा, या संसारात गुंतून काय होणार आहे, असे अंतरंगात तीव्रपणे जेव्हां वाटू लागते, तेव्हां तो सत्त्वगुण समजावा. (४३)

संसारासी त्रासे मन । कांहीं करावें भजन ।
ऐसें मनीं उठे ज्ञान । तो सत्वगुण ॥ ४४ ॥

प्रपंचाच्या योगे मन त्रासून जाते व काहीतरी भगवद्‌भजन करावे असे ज्ञान अंतःकरणात स्फुरण पावू लागते, तो सत्त्वगुण. (४४)

असतां आपुले आश्रमीं । अत्यादरें नित्यनेमी ।
सदा प्रीती लागे रामीं । तो सत्वगुण ॥ ४५ ॥

आपापल्या आश्रमात असता जो अत्यंत आदराने नित्यनेम पाळतो व ज्याचे चित्त अत्यंत प्रेमाने सदा भगवंताचे चरणी जडलेले असते, तो सत्त्वगुण जाणावा. (४५)

सकळांचा आला वीट । परमार्थीं जो निकट ।
आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥ ४६ ॥

ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो व जो सदा परमार्थाच्या निकट असतो व संकटकाळी जो धैर्य धारण करतो, तो सत्त्वगुण. (४६)

सर्वकाळ उदासीन । नाना भोगीं विटे मन ।
आठवे भगवद्भसजन । तो सत्वगुण ॥ ४७ ॥

जो सदासर्वकाळ विषयभोगाविषयी उदासीन असतो, विविध भोगांविषयी ज्याचे मन विटलेले असते व ज्यास भगवद्‌भजनच सर्वकाळ आठवते, तो सत्त्वगुण जाणावा. (४७)

पदार्थीं न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत ।
ऐसा दृढ भावार्थ । तो सत्वगुण ॥ ४८ ॥

ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूवर आसक्त होत नाही, मनात जो अखंड भगवंताचे स्मरण करीत असतो, असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो, तो सत्त्वगुण होय. (४८)

लोक बोलती विकारी । तरी आदिक प्रेमा धरी ।
निश्चय बाणे अंतरीं । तो सत्वगुण ॥ ४९ ॥

त्याचे भगवत्‌प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात पण त्याचे भगवत्‌प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवद्‌भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो, तो सत्त्वगुण जाणावा. (४९)

अंतरीं स्फूर्ती स्फुरे । सस्वरूपीं तर्क भरे ।
नष्ट संदेह निवारे । तो सत्वगुण ॥ ५० ॥

ज्या वेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपासंबंधीच्या विचारांनी मन भरून जाते व वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात, तो सत्त्वगुण होय. (५०)

शरीर लावावें कारणीं । साक्षेप उठे अंतःकर्णी ।
सत्वगुणाची करणी । ऐसी असे ॥ ५१ ॥

हे मनुष्यशरीर कारणी लावावे असा प्रयत्न करण्याविषयी जेव्हा मनाचा दृढ निश्चय होतो, तेव्हा तो सत्त्वगुण जाणावा. (५१)

शांति क्ष्मा आणि दया । निश्चय उपजे जया ।
सत्वगुण जाणावा तया । अंतरीं आला ॥ ५२ ॥

ज्याच्या अंतःकरणात शांती, क्षमा, दया असतात व भगवद्‌भक्तीसंबंधी दृढ निश्चय झालेला असतो, त्याच्या अंतःकरणात सत्त्वगुण येऊन राहिला आहे असे जाणावे. (५२)

आले अतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त ।
येथानुशक्ती दान देन । तो सत्वगुण ॥ ५३ ॥

अतिथि-अभ्यागत आले असता जो त्यांना विमुख, भुकेले धाडीत नाही व जो यथाशक्ती दान देतो, तो सत्त्वगुण जाणावा. (५३)

तडितापडी दैन्यवाणें । आलें आश्रमाचेनि गुणें ।
तयालागीं स्थळ देणें । तो सत्वगुण ॥ ५४ ॥

तपस्वी, बैरागी अथवा कुणी दुःखी दैन्यवाणा आश्रयास आला असता गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून जो त्यांना राहाण्यास जागा देतो, तो सत्त्वगुण होय. (५४)

आश्रमीं अन्नची आपदा । परी विमुख नव्हे कदा ।
शक्तिनुसार दे सर्वदा । तो सत्वगुण ॥ ५५ ॥

आपल्या घरात पुरेसे अन्‍न नसले तरी जो कुणाला विमुख पाठवीत नाही आणि नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो, तो सत्त्वगुण. (५५)

जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना ।
जयास नाहीं कामना । तो सत्वगुण ॥ ५६ ॥

ज्याने जिव्हेवर विजय मिळविलेला असतो, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात व मनात कोणतीही कामना नसते, तो सत्त्वगुण होय. (५६)

होणार तैसें होत जात । प्रपंचीं जाला आघात ।
डळमळिना ज्याचें चित्त । तो सत्वगुण ॥ ५७ ॥

जे होणार ते होतच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी ज्याचे चित्त डळमळत नाही, तेथे सत्त्वगुण जाणावा. (५७)

येका भगवंताकारणें । सर्व सुख सोडिलें जेणें ।
केलें देहाचें सांडणें । तो सत्वगुण ॥ ५८ ॥

केवळ एका भगवंताकरिताच ज्याने सर्व सुखांचा त्याग केलेला असतो, एवढेच नव्हे, तर आपला देहही भगवत्‌चरणी समर्पण केलेला असतो, तो सत्त्वगुण. (५८)

विषईं धांवे वासना । परी तो कदा डळमळिना ।
ज्याचें धारिष्ट चळेना । तो सत्वगुण ॥ ५९ ॥

मनात विषयवासना आली तरी जो कधी डळमळत नाही व ज्याचे मनोधैर्य कधी ढळत नाही, तो सत्त्वगुण समजावा. (५९)

देह आपदेनें पीडला । क्षुधे तृषेनें वोसावला ।
तरी निश्चयो राहिला । तो सत्वगुण ॥ ६० ॥

शरीर दारिद्र्याने अथवा रोगाने पीडलेले असले, तहानभुकेने व्याकूळ झालेले असले, तरी ज्याचा परमार्थाचा निश्चय टिकून राहातो तो सत्त्वगुण होय. (६०)

श्रवण आणी मनन । निजध्यासें समाधान ।
शुद्ध जालें आत्मज्ञान । तो सत्वगुण ॥ ६१ ॥

जो श्रवण, मनन, निदिध्यास जाणीवपूर्वक सातत्याने करतो त्यास शुद्ध आत्मज्ञान होऊन समाधान लाभते. हे सर्व सत्त्वगुणाचे कार्य होय (६१)

जयास अहंकार नसे । नैराशता विलसे ।
जयापासीं कृपा वसे । तो सत्वगुण ॥ ६२ ॥

ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो, अनासक्ती सदा विलसत असते व जो अत्यंत कृपाळू असतो, तो सत्त्वगुण होय. (६२)

सकळांसीं नम्र बोले । मर्यादा धरून चाले ।
सर्व जन तोषविले । तो सत्वगुण ॥ ६३ ॥

जो सर्वांशी नम्रपणे बोलतो, ज्याचे वागणे मर्यादशील असते व जो सर्व लोकांना संतोष देतो, तो सत्त्वगुण जाणावा. (६३)

सकळ जनासीं आर्जव । नाहीं विरोधास ठाव ।
परोपकारीं वेची जीव । तो सत्वगुण ॥ ६४ ॥

जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व प्रेमाने वागतो, त्यामुळे विरोधास जागाच उरत नाही व जो परोपकारासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घालतो, तो सत्त्वगुण समजावा. (६४)

आपकार्याहून जीवीं । परकार्यसिद्धी करावी ।
मरोन कीर्ती उरवावी । तो सत्वगुण ॥ ६५ ॥

जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून प्रयत्नशील असतो, मेल्यावरही कीर्तिरूपाने जो अमर होतो, तो सत्त्वगुण होय. (६५)

पराव्याचे दोषगुण । दृष्टीस देखे आपण ।
समुद्राऐसी साठवण । तो सत्वगुण ॥ ६६ ॥

दुसऱ्याचे दोष, गुण दिसले तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रगट करीत नाही, तो सत्त्वगुण जाणावा. (६६)

नीच उत्तर साहाणें । प्रत्योत्तर न देणें ।
आला क्रोध सावरणें । तो सत्वगुण ॥ ६७ ॥

कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो व जशास तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला तरी जो आवरून धरतो, तो सत्त्वगुण होय. (६७)

अन्यायेंवीण गांजिती । नानापरी पीडा करिती ।
तितुकेंहि साठवी चित्तीं । तो सत्वगुण ॥ ६८ ॥

जरी कुणी काहीही कारण नसताना अन्यायाने छळत असून, नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही जो मोठ्या मनाने चित्तात साठवतो, (त्याच्यासंबंधी विरुद्ध भावना ज्याच्या मनातही येत नाही,) तो सत्त्वगुण समजावा. (६८)

शरीरें घीस साहाणें । दुर्जनासीं मिळोन जाणें ।
निंदकास उपकार करणें । हा सत्वगुण ॥ ६९ ॥

देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशीही मिळून मिसळून वागतो व निंदा करणाऱ्यावरही जो उपकारच करतो, तो सत्त्वगुण असतो. (६९)

मन भलतीकडे धावें । तें विवेकें आवराअवें ।
इंद्रियें दमन करावें । तो सत्वगुण ॥ ७० ॥

मन भलतीकडे धावू लागले तरी जो विवेकाने त्यास आवरतो व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो, तो सत्त्वगुण होय. (७०)

सत्क्रिया आचरावी । असत्क्रिया त्यागावी ।
वाट भक्तीची धरावी । तो सत्वगुण ॥ ७१ ॥

सत्कर्मेच करावी, दुष्कर्मांचा त्याग करावा आणि भक्तिमार्गाचेच अनुसरण करावे असे वाटणे, हा सत्त्वगुण. (७१)

जया आवडे प्रातःस्नान । आवडे पुराणश्रवण ।
नाना मंत्रीं देवतार्चन- । करी, तो सत्वगुण ॥ ७२ ॥

ज्याला प्रातःस्‍नान करणे आवडते, पुराणश्रवणात व नाना मंत्रांनी देवतार्चन करण्यात ज्याला गोडी वाटते, तो सत्त्वगुण होय. (७२)

पर्वकाळीं अतिसादर । वसंतपूजेस तत्पर ।
जयंत्यांची प्रीती थोर । तो सत्वगुण ॥ ७३ ॥

ज्याला पर्वकाळबद्दल फार आदर असतो, जो वसंतपूजा करण्याविषयी तत्पर असतो व देवतांच्या जयंत्यादी उत्सव करण्याची ज्याला गोडी असते, तो सत्त्वगुण. (७३)

विदेसिं मेलें मरणें । तयास संस्कार देणें ।
अथवा सादर होणें । तो सत्वगुण ॥ ७४ ॥

कुणी परदेशी माणूस बेवारसाप्रमाणे मेला, तर त्याचा अंत्यसंस्कार करणे किंवा त्यास हजर राहणे, हे सत्त्वगुणाचे कार्य होय. (७४)

कोणी येकास मारी । तयास जाऊन वारी ।
जीव बंधनमुक्त करी । तो सत्वगुण ॥ ७५ ॥

कोणी कुणास मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडवतो, तो सत्त्वगुण होय. (७५)

लिंगें लाहोलीं अभिशेष । नामस्मरणीं विश्वास ।
देवदर्शनीं अवकाश । तो सत्वगुण ॥ ७६ ॥

लिंगार्चन करणे, पत्रपुष्पांची लाखोली वाहाणे, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे, हा सत्त्वगुण होय. (७६)

संत देखोनि धावें । परम सुख हेलावे ।
नमस्कारी सर्वभावें । तो सत्वगुण ॥ ७७ ॥

संतांना पाहून जो त्यांचे दर्शनासाठी धांव घेतो व त्यांच्या दर्शनाने परमसुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत घालतो, तो सत्त्वगुण जाणावा. (७७)

संतकृपा होय जयास । तेणें उद्धरिला वंश ।
तो ईश्वराचा अंश । सत्वगुणें ॥ ७८ ॥

संतांची कृपा ज्याच्यावर होते, त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्त्वगुणामुळेच त्याच्या ठिकाणीचा ईश्वरांश प्रगट होतो. (७८)

सन्मार्ग दाखवी जना । जो लावी हरिभजना ।
ज्ञान सिकवी अज्ञाना । तो सत्वगुण ॥ ७९ ॥

जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवद्‌भक्तीच्या मार्गास लावतो व अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश देतो, तो सत्त्वगुण समजावा. (७९)

आवडे पुण्य संस्कार । प्रदक्षणा नमस्कार ।
जया राहे पाठांतर । तो सत्वगुण ॥ ८० ॥

ज्यास पुण्य, संस्कार आवडतात, देवास प्रदक्षिणा, नमस्कार करणे आवडते व ज्याचे पाठांतर उत्तम असते, तो सत्त्वगुण होय. (८०)

भक्तीचा हव्यास भारी । ग्रंथसामग्री जो करी ।
धातुमूर्ति नानापरी । पूजी, तो सत्वगुण ॥ ८१ ॥

ज्याला भक्तीचा अंतःकरणपूर्वक हव्यास असतो. जो ग्रंथ जवळ बाळगतो व धातुमूर्तीचीही नानाप्रकारे पूजा करतो, तो सत्त्वगुण असतो. (८१)

झळफळित उपकर्णें । माळा गवाळी आसनें ।
पवित्रे सोज्वळें वसनें । तो सत्वगुण ॥ ८२ ॥

देवपूजेची स्वच्छ चकचकीत उपकरणे, जपमाळ, उपासनामूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुखी व पवित्र व स्वच्छ, सोज्वळ वस्त्रे हे सर्व ज्यास आवडते तो सत्त्वगुण होय. (८२)

परपीडेचें वाहे दुःख । परसंतोषाचें सुख ।
वैराग्य देखोन हरिख- । मानी, तो सत्वगुण ॥ ८३ ॥

जो लोकांचे दुःख, पीडा, कष्ट पाहून दुःखी होतो, लोकांचा संतोष पाहून ज्यास सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो, तो सत्त्वगुण असतो. (८३)

परभूषणें भूषण । परदूषणें दूषण ।
परदुःखें सिणे जाण । तो सत्वगुण ॥ ८४ ॥

जो लोकांचे भूषण ते आपले भूषण मानतो, लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो, परदुःखाने जो कष्टी होतो, तो सत्त्वगुण जाणावा. (८४)

आतां असों हें बहुत । देवीं धर्मीं ज्याचें चित्त ।
भजे कामनारहित । तो सत्वगुण ॥ ८५ ॥

आता हे वर्णन पुरे झाले, थोडक्यात असे म्हणता येईल की, ज्याचे चित्त देवाधर्माचे ठिकाणी जडलेले असते आणि जो निष्काम भावनेने भगवद्‌भजन करतो तो सत्त्वगुण होय. (८५)

ऐसा हा सत्वगुण सात्विक । संसारसागरीं तारक ।
येणें उपजे विवेक । ज्ञानमार्गाचा ॥ ८६ ॥

असा हा सत्त्वगुण अत्यंत सात्त्विक असून तो संसारसागरातून तारून नेणारा आहे. त्याच्या योगानेच ज्ञानमार्गाचा विवेक उत्पन्न होतो. (८६)

सत्वगुणें भगवद्भ क्ती । सत्वगुणें ज्ञानप्राप्ती ।
सत्वगुणें सायोज्यमुक्ती । पाविजेते ॥ ८७ ॥

सत्त्वगुणानेच भगवद्‌भक्ती प्राप्त होते, सत्त्वगुणानेच ज्ञानप्राप्ती होऊन त्यानेच सायुज्यमुक्तीही मिळते. (८७)

ऐसी सत्वगुणाची स्थिती । स्वल्प बोलिलें येथामती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ८८ ॥

याप्रमाणे सत्त्वगुणाची स्थिती येथे थोडक्यात यथामती वर्णन केली आहे. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे काय सांगतो ते ऐकावे. (८८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सत्वगुणनाम समास सातवा ॥ ७ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सत्त्वगुणक्षणनाम’ समास सातवा समाप्त

समास आठवा : सद्‌विद्यानिरूपण

॥ श्रीराम ॥

ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें ।
विचार घेतां बळेंचि बाणे । सद्विद्या आंगीं ॥ १ ॥

आता परम शुद्ध व अती उत्तम अशी सद्‌विद्येची लक्षणे वर्णन करून सांगतो, ती श्रोत्यांनी ऐकावी. त्यांच्यासंबंधी विचार केला असता आपोआपच ती अंगी बाणतात. (१)

सद्विद्येचा जो पुरुष । तो उत्तमलक्षणी विशेष ।
त्याचे गुण ऐकतां संतोष । परम वाटे ॥ २ ॥

जो सद्‌विद्यायुक्त पुरुष असतो, तो विशेष उत्तमगुणांनी युक्त असतो. त्याचे गुण ऐकूनसुद्धा परम संतोष वाटतो. (२)

भाविक सात्विक प्रेमळ । शांति क्ष्मा दयासीळ ।
लीन तत्पर केवळ । अमृतवचनी ॥ ३ ॥

तो भाविक, सात्त्विक, प्रेमळ, शांती, क्षमा व दया यांनी युक्त, लीन, कार्य करण्यात तत्पर आणि केवळ अमृतासारखी मधुरवचने बोलणारा असतो. (३)

परम सुंदर आणी चतुर । परम सबळ आणी धीर ।
परम संपन्न आणी उदार । आतिशयेंसीं ॥ ४ ॥

तो परम सुंदर परम चतुर परम बलवान आणि परम धैर्यशील असून परमसंपन्न असून अत्यंत उदार असतो. (४)

परम ज्ञाता आणी भक्त । माहा पंडीत आणी विरक्त ।
माहा तपस्वी आणी शांत । आतिशयेंसीं ॥ ५ ॥

तो परम ज्ञानी, परम भक्त, महापंडित असून विरक्त आणि महातपस्वी असून अत्यंत शांत असतो. (५)

वक्ता आणी नैराशता । सर्वज्ञ आणी सादरता ।
श्रेष्ठ आणी नम्रता । सर्वत्रांसी ॥ ६ ॥

तो उत्तम वक्ता असून अनासक्त असतो. सर्वज्ञ असून लोकांना आदर देणारा असतो आणि श्रेष्ठ असूनही अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागणारा असतो. (६)

राजा आणी धार्मिक । शूर आणी विवेक ।
तारुण्य आणी नेमक । आतिशयेंसीं ॥ ७ ॥

तो राजा असूनही धार्मिक असतो. शूर असूनही विवेकी असतो. तरुण असूनही अत्यंत नीतिनियमाने वागणारा असतो. (७)

वृधाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी ।
धन्वंतरी परोपकारी । पद्महस्ती ॥ ८ ॥

तो वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म, कुळाचार पाळणार, युक्त आहार घेणारा व कुठल्याही विकाराच्या आधीन न होणार, वैद्यक विद्या जाणणारा, परोपकारी व ज्याच्या हातावर यशाचे प्रतीक असे कमलाचे चिन्ह आहे, असा असतो. (८)

कार्यकर्ता निराभिमानी । गायक आणी वैष्णव जनी ।
वैभव आणी भगवद्भभजनी । अत्यादरें ॥ ९ ॥

उत्तम कार्यकर्ता असून तो निरभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवद्‌भक्त असतो, वैभवसंपन्न असून अतिआदराने भगवद्‌भजन करणारा असतो. (९)

तत्वज्ञ आणी उदासीन । बहुश्रुत आणी सज्जन ।
मंत्री आणी सगुण । नीतिवंत ॥ १० ॥

तो तत्त्वज्ञानी असून उदासीन म्हणजे विरक्त असतो; बहुश्रुत असूनही सज्जन असतो आणि राजाचा मंत्री असूनही सद्‌गुणसंपन्न व नीतिमान असतो. (१०)

आधु पवित्र पुण्यसीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ ।
कर्मनिष्ठ स्वधर्में निर्मळ । निर्लोभ अनुतापी ॥ ११ ॥

तो पवित्र पुण्यशील साधू असून शुद्ध अंतःकरणाचा, कृपाळू व धर्मात्मा असतो. स्वधर्मनिष्ठ निर्मळ कर्मनिष्ठ (निष्काम कर्मयोगी) व निर्लोभी असून तो अनुतापाने विशुद्ध अंतःकरणाचा झालेला असतो. (११)

गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती ।
श्रुति स्मृती लीळा युक्ति । स्तुती मती परीक्षा ॥ १२ ॥

त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते व प्रेमही असते. तो सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्‌क्रिया करणारा उत्तम धारणाशक्ती असणारा व धैर्यशील असतो. श्रुती, स्मृती यांचे त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते, भगवंताच्या लीलांविषयी त्यास प्रेम असून भगवंताची स्तुती कशी करावी हेही तो जाणतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती व वस्तूंची उत्तम पारख त्यास असते. (१२)

दक्ष धूर्त योग्य तार्किक । सत्यसाहित्य नेमक भेदक ।
कुशळ चपळ चमत्कारिक । नाना प्रकारें ॥ १३ ॥

तो नेहमी सावध असून वेळप्रसंग पाहून वागणारा, रीतीने व प्रमाणात तर्क जाणणारा, सत्‌साहित्याची आवड असणारा, नेमनिष्ठ व पारदर्शी, कुशल, चपळ व नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असतो. (१३)

आदर सन्मान तार्तम्य जाणे । प्रयोगसमयो प्रसंग जाणे ।
कार्याकारण चिन्हें जाणे । विचक्षण बोलिका ॥ १४ ॥

कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा, यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशाप्रकारे वागायचे, हे वेळप्रसंग पाहून तो अचूक जाणतो, कार्यकारणसंबंधाची त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. (१४)

सावध साक्षेपी साधक । आगम निगम शोधक ।
ज्ञानविज्ञान बोधक । निश्चयात्मक ॥ १५ ॥

तो सदा सावध, कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादी शास्त्रांचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान व आत्मानुभव दोन्ही असल्याने दुसऱ्यास ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देऊ शकतो. (१५)

पुरश्चरणी तीर्थवासी । धृढव्रती कायाक्लेसी ।
उपासक, निग्रहासी- । करूं जाणे ॥ १६ ॥

तो तीर्थक्षेत्रात वास करणारा व नाना मंत्रांची पुरश्चरणे करणार, दृढव्रती, शरीरकष्टाची तमा बाळगणारा व इंद्रियनिग्रह करून उपासना करणारा असतो. (१६)

सत्यवचनी शुभवचनी । कोमळवचनी येकवचनी ।
निश्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ ॥

तो नेहमी सत्यभाषण करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एकनिष्ठेने पाळणारा व कोमल शब्द उच्चारणारा असतो. सदासर्वकाळ तो निश्चयात्मक व दुसऱ्यास सौख्य होईल, असेच बोलतो. (१७)

वासनातृप्त सखोल योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी ।
सौम्य सात्विक शुद्धमार्गी । निःकपट निर्वेसनी ॥ १८ ॥

त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्त्व भव्य आणि सुप्रसन्न असते. तो वैराग्यसंपन्न असूनही सौम्य व सात्त्विक असतो. तसेच निष्कपटी, निर्व्यसनी असून नेहमी शुद्ध मार्गाचे अनुसरण करणारा असतो. (१८)

सुगड संगीत गुणग्राही । अनापेक्षी लोकसंग्रही ।
आर्जव सख्य सर्वहि । प्राणीमात्रासी ॥ १९ ॥

तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणकार व गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो व सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वाने व सरलतेने वागणारा असतो. (१९)

द्रव्यसुची दारासुची । न्यायसुची अंतरसुची ।
प्रवृत्तिसुची निवृत्तिसुची । सर्वसुची निःसंगपणें ॥ २० ॥

द्रव्याचे, पति-पत्नी संबंधाचे, न्याय-अन्यायाचे, अंतःकरणाचे, तसेच प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे प्रपंच व परमार्थातील पावित्र्य अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निःसंग वृत्तीमुळे दिसून येते. (२०)

मित्रपणें परहितकारी । वाग्माधुर्य परशोकहारी ।
सामर्थ्यपणें वेत्रधारी । पुरूषार्थें जगमित्र ॥ २१ ॥

तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहिततत्पर असतो, मधुर वाणीने लोकांच्या दुःखाचे तो हरण करतो, सामर्थ्यसंपन्न असल्याने दुसऱ्यांचे संरक्षण करतो आणि पौरुषसंपन्न असल्याने सर्व जगाचा मित्र बनतो. (२१)

संशयछेदक विशाळ वक्ता । सकळ क्लृप्त असोनी श्रोता ।
कथानिरूपणीं शब्दार्था । जाऊंच नेदी ॥ २२ ॥

सर्वसमावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो व म्हणून सर्व संशयांचे तो निरसन करू शकतो. स्वतः अत्यंत विद्वान व ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथानिरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. (२२)

वेवादरहित संवादी । संगरहित निरोपाधी ।
दुराशारहित अक्रोधी । निर्दोष निर्मत्सरी ॥ २३ ॥

वादविवाद टाळून संवाद करणे त्याला जमते. तो निःसंग वृत्तीचा असल्याने कुठलीही उपाधी आपल्यामागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही व कुणावर कधी क्रोधही करीत नाही. असा तो सदा निर्मत्सरी व निर्दोष असतो. (२३)

विमळज्ञानी निश्चयात्मक । समाधानी आणी भजक ।
सिद्ध असोनी साधक । साधन रक्षी ॥ २४ ॥

तो संदेहरहित विमलज्ञानाने युक्त असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंताचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनाचे रक्षण करीत एखाद्या साधकाप्रमाणेच राहतो. (२४)

सुखरूप संतोषरूप । आनंदरूप हास्यरूप ।
ऐक्यरूप आत्मरूप । सर्वत्रांसी ॥ २५ ॥

तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्याने त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिमंत सुख वा संतोषच त्याच्या रूपाने प्रगट झाले आहेत असे वाटते. तो नेहमी आनंदी, सुप्रसन्न, स्मितहास्य ज्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असा दिसतो. (२५)

भाग्यवंत जयवंत । रूपवंत गुणवंत ।
आचारवंत क्रियावंत । विचारवंत स्थिती ॥ २६ ॥

तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचारसंपन्न असून क्रियाशील व सुविचारी असतो. (२६)

येशवंत किर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत ।
वीर्यवंत वरदवंत । सत्यवंत सुकृती ॥ २७ ॥

तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिसंपन्न, सामर्थ्यवान, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात, असा सत्यवंत व पुण्यकर्मे करणाराही असतो. (२७)

विद्यावंत कळावंत । लक्ष्मीवंत लक्ष्णवंत ।
कुळवंत सुचिष्मंत । बळवंत दयाळु ॥ २८ ॥

तो विद्यावंत, कलावंत असतो. ऐश्वर्यसंपन्न असून उत्तम लक्षणांनी युक्त असतो. कुलीन असून पवित्र आचरणाचा असतो व बलशाली असूनही दयाळू असतो (२८)

युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ । बुद्धिवंत बहुधारिष्ट ।
दीक्षावंत सदासंतुष्ट । निस्पृह वीतरागी ॥ २९ ॥

तो युक्तिप्रयुक्ती जाणणारा, गुणसंपन्न, वरिष्ठ व बुद्धिमान असून धैर्यशीलही असतो. त्याने गुरूकडून दीक्षा घेतलेली असते व तो सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते व तो अत्यंत वैराग्यसंपन्न असतो. (२९)

असो ऐसे उत्तम गुण । हें सद्विद्यचें लक्षण ।
अभ्यासाया निरूपण । अल्पमात्र बोलिलें ॥ ३० ॥

असो. याप्रमाणे येथे जे उत्तम गुण सांगितले आहेत, ते सद्‌विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणूनच त्यांचे थोडेसे वर्णन केले आहे. (३०)

रूपलावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ ३१ ॥

रूपाचे सौंदर्य हे काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. जे उपजत गुण असतात, त्यांत परिवर्तन घडवून आणता येत नाही. तेथे काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो, त्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. (३१)

ऐसी सद्विद्या बरवी । सर्वत्रांपासी असावी ।
परी विरक्तपुरुषें अभ्यासवी । अगत्यरूप ॥ ३२ ॥

याप्रमाणे ही उत्तम अशी विद्या सर्वांपाशीच असावी असे समर्थ सांगतात. निदान विरक्त पुरुषांनी तरी अगत्याने तिचा अभ्यास करावा. (३२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सद्विद्यानिरूपणनाम समास आठवा ॥ ८ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सद्‌विद्यानिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.

समास नववा : विरक्तलक्षण

॥ श्रीराम ॥

ऐका विरक्तांची लक्षणें । विरक्तें असावें कोण्या गुणें ।
जेणें आंगीं सामर्थ्य बाणें । योगियाचें ॥ १ ॥

श्रीसमर्थ म्हणतात की, आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो ती ऐका. विरक्त पुरुषाच्या अंगी कोणते गुण हवेत ते प्रथम सांगतो. कारण वैराग्यामुळे योग्याचे अंगी सामर्थ्य बाणते व योग सिद्धीस जातो. (१)

जेणें सत्कीर्ति वाढे । जेणें सार्थकता घडे ।
जेणेंकरितां महिमा चढे । विरक्तांसी ॥ २ ॥

विरक्तीमुळेच उत्तम कीर्ती मिळते, मनुष्यजन्माचे सार्थक होते व वैराग्यसंपन्न मनुष्यास थोरवी प्राप्त होते. (२)

जेणें परमार्थ फावे । जेणें आनंद हेलावे ।
जेणें विरक्ति दुणावे । विवेकेंसहित ॥ ३ ॥

या गुणामुळे स्वस्वरूपसाक्षात्कार होतो, त्यामुळे आनंद उचंबळून येतो आणि विवेकासहित वैराग्यही दुपटीने वाढू लागते. (३)

जेणें सुख उचंबळे । जेणें सद्विद्या वोळे ।
जेणें भाग्यश्री प्रबळे । मोक्षेंसहित ॥ ४ ॥

त्या गुणांनीच सुख उचंबळून येते, सद्‌विद्येची प्राप्ती होते आणि मोक्षासहित सर्व भाग्य व ऐश्वर्य यांनी जीवन संपन्न बनते. (४)

मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती ।
मुखीं राहे सरस्वती । मधुर बोलावया ॥ ५ ॥

सर्व मनोरथ पूर्ण होतात, सर्व कामनांची पूर्तता होते आणि मधुर बोलण्याकरिता जणू सरस्वतीच जिभेवर येऊन राहते. (५)

हे लक्षणें श्रवण कीजे । आणी सदृढ जीवीं धरिजे ।
तरी मग विख्यात हो‍ईजे । भूमंडळीं ॥ ६ ॥

आता जी लक्षणे सांगतो, ती ऐकून हृदयात अत्यंत दृढपणे धारण करा, म्हणजे मग तो मनुष्य या जगात प्रसिद्धी मिळवतो. (६)

विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें ।
विरक्तें धारिष्ट धरावें । दमनविषईं ॥ ७ ॥

विरक्त माणसाने विवेकाने वागावे. त्याने जगात अध्यात्माचा प्रचार करावा व इंद्रियांवर ताबा ठेवण्यासंबंधी धैर्य धारण करावे. (७)

विरक्तें राखावें साधन । विरक्तें लावावें भजन ।
विरक्तें विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटवावें ॥ ८ ॥

विरक्त पुरुषाने साधनाचा कधीही त्याग करू नये. त्याने लोकांमध्ये भगवद्‌भजनाची आवड उत्पन्न करावी आणि विशेषेकरून आपल्या वाणीने आणि आचरणाने जगात ब्रह्मज्ञान लोकांना स्पष्ट करून सांगावे. (८)

विरक्तें भक्ती वाढवावी । विरक्ते शांती दाखवावी ।
विरक्तें येत्नें करावी । विरक्ती आपुली ॥ ९ ॥

विरक्ताने लोकांत भक्तिमार्गाचा प्रचार करावा, त्याने आपल्या वागण्याने शांती कशी असते, हे लोकांना दाखवून द्यावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावे. (९)

विरक्तें सद्क्रि या प्रतिष्ठावी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी ।
विरक्तें नैराशता धरावी । सदृढ जिवेंसीं ॥ १० ॥

विरक्ताने सत्‌क्रियेचा आदर करून समाजात तिची प्रतिष्ठापना करावी. त्याने विरक्तीचा, अनासक्तीचा प्रचार करावा आणि स्वतःही प्रयत्नपूर्वक निःसंगता दृढपणे हृदयी धारण करावी. (१०)

विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति आवलंबावी ।
विरक्तें क्ष्मा सांभाळावी । अत्यादरेंसी ॥ ११ ॥

विरक्ताने धर्मस्थापना करावी. स्वतः नेहमी नीतीस धरून वागावे आणि अत्यंत आदराने क्षमाशील वृत्ती जतन करावी. (११)

विरक्तें परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा ।
विरक्तें सन्निध ठेवावा । सन्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥

विरक्ताने परमार्थाचे पुनरुज्जीवन करावे. त्याने नित्यानित्य-विवेक करावा व नेहमी सत्त्वगुणाचे रक्षण करून त्याच्या साह्याने सन्मार्गाचे आचरण करावे. (१२)

विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निववावीं ।
विरक्तें साबडीं नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३ ॥

विरक्ताने भाविकांना आधार द्यावा, भगवद्‌भक्ताची अंतःकरणे निववावी आणि जे भोळेभाबडे लोक भगवंतास शरण आले असतील, त्यांची कधीही उपेक्षा करू नये. (१३)

विरक्तें असावें परम दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष ।
विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥

विरक्ताने नेहमी सावध असावे, दुसऱ्याचे अंतरंग जाणून घ्यावे आणि परमार्थ वाढेल असा प्रयत्न कमवा. (१४)

विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा ।
विरक्तें वग्त्रृत्वें उभारावा । मोडला परमार्थ ॥ १५ ॥

विरक्ताने नेहमी शास्त्राभ्यास, योगाभ्यास, ध्यानाभ्यास इत्यादी अभ्यास करावा. त्याने नेहमी प्रयत्नशील असावे आणि परमार्थ मार्गासंबंधी लोकांची उदासीनता, आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या बळावर दूर करून परत अज्ञ लोकांना परमार्थाकडे वळवावे. (१५)

विरक्तें विमळज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य स्तवीत जावें ।
विरक्तें निश्चयाचें करावें । समाधान ॥ १६ ॥

विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करावा, त्याने वैराग्याची स्तुती करावी व लोकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना नि संदेह असे समाधान मिळवून द्यावे. (१६)

पर्वें करावीं अचाटें । चालवावी भक्तांची थाटे ।
नाना वैभवें कचाटें । उपासनामार्ग ॥ १७ ॥

विरक्ताने अत्यंत उत्साहाने निरनिराळे पर्वकाळ व महोत्सव साजरे करावे. त्यानिमित्ताने मोठ्या आदराने, थाटाने भक्तांचे समुदाय एकत्रित करावेत आणि प्रयत्नपूर्वक अत्यंत वैभवाने थाटामाटात त्या महोत्सवात भजन, कीर्तन, प्रवचनादी उपासनामार्गांचे अवलंबन करावे. (१७)

हरिकीर्तनें करावीं । निरूपणें माजवावीं ।
भक्तिमार्गे लाजवावीं । निंदक दुर्जनें ॥ १८ ॥

त्याने हरिकीर्तने करावी. प्रवचने, निरूपणे यांची एकच गर्दी करून सोडावी आणि भक्तिमार्गाचा आवेशाने प्रचार करावा की, त्यायोगे निंदक, दुर्जन यांना लाज वाटावी. (१८)

बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार ।
पुण्यमार्गाचा विस्तार । बळेंचि करावा ॥ १९ ॥

अनेकांवर परोपकार करावा, उत्तम आचाराचा जीर्णोद्धार करावा आणि प्रयत्नपूर्वक पुण्यमार्गाचा प्रचार प्रसार करावा. (१९)

स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भोजन ।
नित्यनेम पवित्रपण । अंतरशुद्ध असावें ॥ २० ॥

स्‍नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवद्‌भजन, तसेच नित्यनेम व पवित्रपणा यांचा त्याने स्वतः अवलंब करून लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व हे सर्व करीत असतां अंतःकरणही अत्यंत शुद्ध असावे. (२०)

दृढ निश्चयो धरावा । संसार सुखाचा करावा ।
विश्वजन उद्धरावा । संसर्गमात्रें ॥ २१ ॥

विरक्ताने दृढ निश्चयाने वागावे, सर्व लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि असे वागावे की केवळ संगतीनेही जगातील लोकांचा उद्धार होईल. (२१)

विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार ।
विरक्तें असावें तत्पर । निरूपणविषईं ॥ २२ ॥

विरक्ताने धीरगंभीर व अत्यंत उदार असावे. तसेच त्याने अध्यात्मनिरूपण करण्यातही नेहमी तत्पर असावे. (२२)

विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्ध मार्गें जावें ।
विरक्तें झिजोन उरवावें । सद्कीरर्तीसी ॥ २३ ॥

विरक्ताने नेहमी सावध असावे आणि नेहमी सन्मार्गानेच चालावे. लोकांसाठी शरीर झिजवून त्याने उत्तम कीर्तिरूपाने अमर व्हावे. (२३)

विरक्तें विरक्त धुंडावे । विरक्तें साधु वोळखावे ।
विरक्तें मित्र करावे । संत योगी सज्जन ॥ २४ ॥

विरक्ताने स्वतःसारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा, समाजातील साधुपुरुषांना ओळखून, संत, योगी, सजन इत्यादींचे बरोबर त्याने मित्रत्वाचे संबंध जोडावे. त्या सर्वांना आपलेसे करावे. (२४)

विरक्तें करावीं पुरश्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें ।
विरक्तें करावीं नानास्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥

विरक्ताने स्वतः नाना पुरश्चरणे करावीत, निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे, तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासनेस योग्य अशी परम रमणीय नाना स्थाने त्याने निर्माण करावी. (२५)

विरक्तें उपाधी करावी । आणि उदासवृत्ति न संडावी ।
दुराशा जडो नेदावी । कोणयेकविषईं ॥ २६ ॥

विरक्ताने लोकसंग्रह करावा पण स्वतः कोठेही आसक्त होऊ नये. कशाविषयीही भलती आशा कधीही बाळगू नये. (२६)

विरक्तें असावें अंतरनिष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट ।
विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधेनपणें ॥ २७ ॥

विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सुटू देऊ नये. आचारभ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये. (२७)

विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा ।
विरक्त चतुर असाअवा । सर्वप्रकारें ॥ २८ ॥

विरक्तास वेळप्रसंगाचे भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे. यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे जरूर आहे. (२८)

विरक्तें येकदेसी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें ।
विरक्तें अवघें जाणावें । ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥

विरक्ताने एकांगी कधी असू नये. त्याने प्रत्येक विषयाचा सर्व बाजूने अभ्यास करावा आणि जाणण्यायोग्य जे जे असेल, ते त्याने सर्व जाणून घ्यावे. (२९)

हरिकथा निरूपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान ।
पिंडज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥

त्याने भगवंताची सगुण चरित्रे जाणून घ्यावीत, वेदान्ताचे निरूपणही त्यास साध्य असावे. सगुणभजन व ब्रह्मज्ञान तसेच पिंडज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादी उपासनेतील निर्गुण, सगुण भेद वगैरेसंबंधी सर्व त्यास ज्ञात असावे. (३०)

कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावें ॥ ३१ ॥

परमात्मप्राप्तीचा कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धान्तमार्ग, प्रवृत्तिमार्ग, निवृत्तिमार्ग या सर्वांचे सखोल ज्ञान विरक्तास असावे. (३१)

प्रेमळ स्थिती उदास स्थिती । योगस्थिती ध्यानस्थिती ।
विदेह स्थिती सहज स्थिती । सकळ जाणावें ॥ ३२ ॥

भगवद्‌भक्ताची प्रेममय स्थिती किंवा ज्ञानी लोकांची उदासस्थिती, योग्यांची योगस्थिती व ध्यानी लोकांची ध्यानस्थिती तसेच जीवमुक्ताची विदेहावस्था व सहजावस्था यांचे अचूक व स्वानुभवजन्य ज्ञान विरक्त पुरुषास असावे. (३२)

ध्वनी लक्ष मुद्रा आसनें । मंत्र यंत्र विधी विधानें ।
नाना मतांचें देखणें । पाहोन सांडावें ॥ ३३ ॥

याशिवाय नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश व त्यांचे दर्शन, विविध प्रकारच्या मुद्रा, योगासने, विविध मंत्र आणि विविध प्रकारची यंत्रे, तसेच अनेक प्रकारची विधिविधाने व परमार्थ मार्गातील विविध प्रचलित मते या सर्वांचे ज्ञानही विरक्त पुरुषाने करून घेऊन नंतर वाटल्यास सोडून द्यावे. (३३)

विरक्तें असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र ।
विरक्तें असावें विचित्र । बहुगुणी ॥ ३४ ॥

विरक्त पुरुषाची सर्वांशी मैत्री असावी, तो जगन्मित्र असला, तरी त्याने पूर्ण स्वतंत्र असावे. विचित्र वाटतील असे अनेक गुणही त्याच्या ठिकाणी असावेत. थोडक्यात तो अनेक गुणांनी संपन्न असावा. (३४)

विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त ।
विरक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥

विरक्ताने नेहमी वैराग्यसंपन्न असणे जरूर आहे. तो हरिभक्त असावा. तसेच जीवन्मुक्त असून निःसंग असावा. (३५)

विरक्तें शास्त्रें धांडोळावीं । विरक्तें मतें विभांडावीं ।
विरक्तें मुमुक्षें लावावीं । शुद्धमार्गें ॥ ३६ ॥

विरक्ताने अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा, परमार्थास प्रतिकूल मतांचे त्याने खंडण करावे आणि मुमुक्षूंना शुद्ध परमार्थमार्ग कळावा म्हणून मार्गदर्शनही त्याने करावे. (३६)

विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा ।
विरक्तें आपला म्हणावा । विश्वजन ॥ ३७ ॥

विरक्ताने शुद्ध परमार्थ मार्गासंबंधी अचूक मार्गदर्शन करावे, लोकांच्या मनातील शंका, संशय यांचे निरसन त्याने करावे व सर्व विश्वातील लोकांवर प्रेम करावे. (३७)

विरक्तें निंदक वंदावें । विरक्तें साधक बोधावे ।
विरक्तें बद्ध चेववावे- । मुमुक्षनिरूपणें ॥ ३८ ॥

विरक्ताने आपल्या निंदकांनाही वंदन करावे. जे साधक असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करवा व जे बद्ध असतील त्यांना अध्यात्मनिरूपणाच्या योगे चेतवावे, स्वहिताचा विचार करण्यासाठी जागृत करावे. (३८)

विरक्तें उत्तम गुण घ्यावे । विरक्तें अवगुण त्यागावे ।
नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९ ॥

विरक्त पुरुषाने उत्तम गुण घ्यावेत, अवगुणांचा त्याग करावा व आपल्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अपायांचा विवेकाच्या बळावर नाश करावा. (३९)

ऐसीं हे उत्तम लक्षणें । ऐकावीं येकाग्र मनें ।
याचा अव्हेर न करणें । विरक्त पुरुषें ॥ ४० ॥

अशी ही विरक्त पुरुषाची उत्तम लक्षणे येथे सांगितली आहेत, विरक्त पुरुषाने ती एकाग्र मनाने श्रवण करावीत, त्यांचा अव्हेर करू नये. (४०)

इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें ।
श्रोतीं उदास न करावें । बहु बोलिलें म्हणौनी ॥ ४१ ॥

स्वाभाविकरीत्या मला जी पटली, ती मी येथे सहजपणे सांगितली आहेत, त्यांतील पटतील तितकी श्रोत्यांनी घ्यावी. मी फार बोललो म्हणून त्यांनी खिन्न होऊ नये. (४१)

परंतु लक्षणें ने घेतां । अवलक्षणें बाष्कळता ।
तेणें त्यास पढतमूर्खता । येवों पाहे ॥ ४२ ॥

परंतु ही उत्तम लक्षणे न घेता बाष्कळपणे जो अवलक्षणे घेतो, त्याच्या ठिकाणी पढतमूर्खता मात्र येते. (४२)

त्या पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण ।
बोलिलें असे सावधान- । हो‍ऊन आ‍इका ॥ ४३ ॥

त्या पढतमूर्खांची लक्षणे पुढील समासात वर्णन केली आहेत. तरी श्रोत्यांनी ती सावध होऊन ऐकावी. (४३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विरक्तलक्षणनाम समास नववा ॥ ९ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘विरक्तक्षणनाम’ समास नववा समाप्त.

समास दहावा : पढतमूर्खलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां सांगितलीं लक्षणें । मूर्खा‍आंगी चातुर्य बाणे ।
आतां ऐका शाहाणे- । असोनि, मूर्ख ॥ १ ॥

यापूर्वी ज्यायोगे मूर्ख माणूसही चतुर बनेल ती लक्षणे सांगितली. आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात, त्यांची लक्षणे ऐका. (१)

तया नांव पढतमूर्ख । श्रोतीं न मनावें दुःख ।
अवगुण त्यागितां , सुख- । प्राप्त होये ॥ २ ॥

अशा लोकांना पढतमूर्ख म्हणतात. यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे वाटले, तरी श्रोत्यांनी दुःख मानू नये. त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा, म्हणजे सुख लाभेल. (२)

बहुश्रुत आणि वित्पन्न । प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान ।
दुराशा आणि अभिमान । धरी, तो येक पढतमूर्ख ॥ ३ ॥

जो बहुश्रुत, थोर व्यासंगी आणि विद्वान आहे, ब्रह्मज्ञानही सुंदर रीतीने सांगतो, पण मनात दुराशा आणि अभिमान बाळगतो, तो एक पढतमूर्खच जाणावा. (३)

मुक्तक्रिया प्रतिपादी । सगुणभक्ति उछेदी ।
स्वधर्म आणि साधन निंदी । तो येक पढतमूर्ख ॥ ४ ॥

जो स्वेच्छाचाराचे प्रतिपादन करतो, सगुण भक्तीचे खंडण करतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो, तो पढतमूर्ख असतो. (४)

आपलेन ज्ञातेपणें । सकळांस शब्द ठेवणें ।
प्राणीमात्राचें पाहे उणें । तो येक पढतमूर्ख ॥ ५ ॥

जो स्वतःस फार विद्वान समजून इतर सर्वांना नावे ठेवतो, प्राणिमात्राचे ठिकाणी दोषच पाहतो, तोही पढतमूर्खच असतो. (५)

शिष्यास अवज्ञा घडे । कां तो संकटीं पडे ।
जयाचेनि शब्दें मन मोडे । तो येक पढतमूर्ख ॥ ६ ॥

जो शिष्यास अवज्ञा घडेल किंवा तो संकटात पडेल अशी आज्ञा करतो व ज्याच्या बोलण्याने इतरांच्या मनाला दुःख होते, असे मर्मभेदक शब्द बोलणाराही पढतमूर्खच असतो. (६)

रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिळ अंतःकर्णी ।
वैभव देखोन वाखाणी । तो येक पढतमूर्ख ॥ ७ ॥

जो रजोगुणी, तमोगुणी असतो, कपटी, कुटिल अंतःकरणाचा असतो आणि वैभवास भुलून श्रीमंत माणसाची स्तुती करू लागतो, तो पढतमूर्खच होय. (७)

समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ ८ ॥

जो एखादा ग्रंथ संपूर्ण न पाहता उगीचच त्यातील दोष काढून नावे ठेवतो, त्यांचे गुण सांगू लागले असता ते ऐकूनही न घेता दोषच पाहातो, तो पढतमूर्ख जाणावा. (८)

लक्षणें ऐकोन मानी वीट । मत्सरें करी खटपट ।
नीतिन्याय उद्धट । तो येक पढतमूर्ख ॥ ९ ॥

चांगली लक्षणे सांगायला गेले की ज्याला कंटाळा येतो, जो मत्सरग्रस्त होऊन नाना खटपटी, लटपटी करतो व ज्याला नीतिन्यायाची जराही चाड नसून जो उद्धट असतो, तोही पढतमूर्खच होय. (९)

जाणपणें भरीं भरे । आला क्रोध नावरे ।
क्रिया शब्दास अंतरे । तो येक पढतमूर्ख ॥ १० ॥

स्वतः आपण मोठे ज्ञानी आहोत, असे समजून जो हट्टास पेटतो, ज्याला राग आला तर आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच, तो पढतमूर्ख असतो. (१०)

वक्ता अधिकारेंवीण । वग्त्रृत्वाचा करी सीण ।
वचन जयाचें कठीण । तो येक पढतमूर्ख ॥ ११ ॥

योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि उगीचच बोलण्याचे कष्ट घेतो, ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते, तो पढतमूर्ख जाणावा. (११)

श्रोता बहुश्रुतपणें । वक्तयास आणी उणें ।
वाचाळपणाचेनि गुणें । तो येक पढतमूर्ख ॥ १२ ॥

एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो, पण वाचाळपणा करून वक्त्याचा अपमान करतो, तो पढतमूर्खच समजावा. (१२)

दोष ठेवी पुढिलांसी । तेंचि स्वयें आपणापासीं ।
ऐसें कळेना जयासी । तो येक पढतमूर्ख ॥ १३ ॥

जो ज्या गोष्टीसाठी लोकाला दोष देतो; पण स्वतः मात्र तीच गोष्ट करतो, असा स्वतःचे दोष न जाणणारा माणूस पढतमूर्खच असतो. (१३)

अभ्यासाचेनि गुणें । सकळ विद्या जाणे ।
जनास निवऊं नेणें । तो येक पढतमूर्ख ॥ १४ ॥

जो अभ्यासाच्या योगाने सर्व विद्यांचे ज्ञान करून घेतो, पण लोकांच्या अंतःकरणास सुख-समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही, तो पढतमूर्खच समजावा. (१४)

हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें ।
ऐसा जो प्रपंची गुंते । तो येक पढतमूर्ख ॥ १५ ॥

कोळिष्टकांच्या नाजूक धाग्याने हत्ती बंधनात सापडावा किंवा सुगंधाच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती करून घेण्यास समर्थ असूनही जो मायेच्या कोमल धाग्यांमुळे प्रपंचातच गुंतून पडतो, तो पढतमूर्खच होय. (१५)

स्त्रियंचा संग धरी । स्त्रियांसी निरूपण करी ।
निंद्य वस्तु आंगिकारी । तो येक पढतमूर्ख ॥ १६ ॥

जो स्त्रियांच्या संगतीत राहातो, स्त्रियांपुढेच ब्रह्मनिरूपण आणि निंद्य वस्तूंचे सेवन करतो, तो पढतमूर्ख. (१६)

जेणें उणीव ये आंगासी । तेंचि दृढ धरी मानसीं ।
देहबुद्धि जयापासीं । तो येक पढतमूर्ख ॥ १७ ॥

ज्यायोगे आपल्याला कमीपणा येईल तेच जो अंतःकरणात दृढ धरतो व देहबुद्धी ज्याची दृढ असते, तो पढतमूर्ख जाणावा. (१७)

सांडूनियां श्रीपती । जो करी नरस्तुती ।
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती- । वर्णी, तो येक पढतमूर्ख ॥ १८ ॥

लक्ष्मीपती भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो नरस्तुति करतो किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो, तो पढतमूर्खच असतो. (१८)

वर्णी स्त्रियांचे आवेव । नाना नाटकें हावभाव ।
देवा विसरे जो मानव । तो येक पढतमूर्ख ॥ १९ ॥

जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो, नाना नाटके, हावभाव, नकला करण्यात प्रवीण असतो, पण जो मनुष्य देवाला मात्र विसरतो तो पढतमूर्खच होय. (१९)

भरोन वैभवाचे भरीं । जीवमात्रास तुछ्य करी ।
पाषांडमत थावरी । तो येक पढतमूर्ख ॥ २० ॥

ऐश्वर्य प्राप्त झाले असता घमेंडीने जो जीवमात्रास तुच्छ समजतो, तसेच शास्त्रविरुद्ध मताचे प्रतिपादन करतो तोही पढतमूर्खच असतो. (२०)

वित्पन्न आणी वीतरागी । ब्रह्मज्ञानी माहायोगी ।
भविष्य सांगों लागे जगीं । तो येक पढतमूर्ख ॥ २१ ॥

जो बहुश्रुत विद्वान असतो, विरक्तही असतो एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञानी असून महायोगीही असतो; पण जो लोकांमध्ये भविष्य सांगू लागतो, तोसुद्धा पढतमूर्खच जाणावा. (२१)

श्रवण होतां अभ्यांतरीं । गुणदोषाची चाळणा करी ।
परभूषणें मत्सरी । तो येक पढतमूर्ख ॥ २२ ॥

काही श्रवण करीत असताना जो मनामध्ये त्यातील गुणदोषांसंबंधी चिंतन करू लागतो व दुसऱ्याचे चांगले पाहून जो त्याचा मत्सर करू लागतो, तोही पढतमूर्खच असतो. (२२)

नाहीं भक्तीचें साधन । नाहीं वैराग्य ना भजन ।
क्रियेविण ब्रह्मज्ञान- । बोले, तो येक पढतमूर्ख ॥ २३ ॥

जो भक्तीचे काही साधन करीत नाही, जो वैराग्यसंपन्न नसतो व काही भजन, पूजन इत्यादी क्रिया न करताच लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो, तो पढतमूर्ख होय. (२३)

न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र ।
पवित्रकुळीं जो अपवित्र । तो येक पढतमूर्ख ॥ २४ ॥

जो तीर्थक्षेत्र, वेद अथवा शास्त्र इत्यादी काहीच मानत नाही व पवित्रकुळी जन्मला असून ज्याचे आचरण अपवित्र असते, तो पढतमूर्ख समजावा. (२४)

आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।
सवेंचि निंदी अनादरी । तो येक पढतमूर्ख ॥ २५ ॥

जो आदर देतो, त्याची जो मनधरणी करतो, ज्याची योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो आणि नंतर स्वतः त्याची निंदा करतो, त्याचा अनादर करतो, तो एक पढतमूर्खच असतो. (२५)

मागें येक पुढें येक । ऐसा जयाचा दंडक ।
बोले येक करी येक । तो येक पढतमूर्ख ॥ २६ ॥

माणसाच्या तोंडावर एक बोलायचे व त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे अशी ज्याची वागण्याची रीत असते; जो बोलतो एक तर करतो दुसरेच, तो पढतमूर्खच समजावा. (२६)

प्रपंचविशीं सादर । परमार्थीं ज्याचा अनादर ।
जाणपणें घे अधार । तो येक पढतमूर्ख ॥ २७ ॥

जो प्रपंचाविषयी आदर बाळगतो व परमार्थाचा अनादर करतो आणि आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ शास्त्रवचनांचा वाटेल तसा आधार घेतो, तो पढतमूर्ख जाणावा. (२७)

येथार्थ सांडून वचन । जो रक्षून बोले मन ।
ज्याचें जिणें पराधेन । तो येक पढतमूर्ख ॥ २८ ॥

जो योग्य ते सांगायचे सोडून ऐकणाराचे मन राखण्यासाठी अयोग्यही बोलतो व ज्याचे जगणे परस्वाधीन लोकांवर अवलंबून असते, तोही पढतमूर्खच असतो. (२८)

सोंग संपाधी वरीवरी । करूं नये तेंचि करी ।
मार्ग चुकोन भरे भरीं । तो येक पढतमूर्ख ॥ २९ ॥

जो वर वर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो; पण (चोरून) जे करू नये तेच करतो, चांगला मार्ग सोडून हट्टाने आडमार्गास लागतो, तो पढतमूर्खच होय. (२९)

रात्रंदिवस करी श्रवण । न संडी आपले अवगुण ।
स्वहित आपलें आपण । नेणे तो येक पढतमूर्ख ॥ ३० ॥

जो रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत असूनही आपले अवगुण सोडत नाही, आपले स्वतःचे हित कशात आहे हे जो जाणत नाही, तो पढतमूर्ख असतो. (३०)

निरूपणीं भले भले । श्रोते ये‍ऊन बैसले ।
क्षुद्रें लक्षुनी बोले । तो येक पढतमूर्ख ॥ ३१ ॥

जो निरूपण करीत असताना मोठे अधिकारी श्रोते ऐकायला येऊन बसले असता जो त्यांची क्षुद्र न्यूने काढून बोलतो, तो पढतमूर्खच जाणावा. (३१)

शिष्य जाला अनधिकारी । आपली अवज्ञा करी ।
पुन्हां त्याची आशा धरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३२ ॥

ज्याचा शिष्य अनधिकारी झाल्याने गुरूची अवज्ञा करीत असतानाही जो तिकडे दुर्लक्ष करून परत त्या शिष्याची आशा धरतो, तो पढतमूर्खच असतो. (३२)

होत असतां श्रवण । देहास आलें उणेपण ।
क्रोधें करी चिणचिण । तो येक पढतमूर्ख ॥ ३३ ॥

श्रवण करीत असता जर देहधर्मामुळे त्यात अडथळा आला, उणीव भासू लागली, तर जो रागाने चिडचिड करतो, तो पढतमूर्खच होय. (३३)

भरोन वैभवाचे भरीं । सद्गु२रूची उपेक्षा करी ।
गुरुपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३४ ॥

आपल्या ऐश्वर्याच्या मदाने जो सद्‌गुरूची उपेक्षा करतो आणि गुरुपरंपरा कोणासही सांगत नाही, तो पढतमूर्ख जाणावा. (३४)

ज्ञान बोलोन करी स्वार्थ । कृपणा ऐसा सांची अर्थ ।
अर्थासाठीं लावी परमार्थ । तो येक पढतमूर्ख ॥ ३५ ॥

ज्ञानाच्या गोष्टी सांगून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूष माणसासारखा द्रव्यसंचय करतो, संपत्ती मिळविण्यासाठी जो परमार्थाचा उपयोग करतो, तो पढतमूर्ख समजावा. (३५)

वर्तल्यावीण सिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी ।
पराधेन गोसावी । तो येक पढतमूर्ख ॥ ३६ ॥

जो स्वत: तसे आचरण न करता लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो. वास्तविक कुणी विचारल्याखेरीज सांगू नये अशी ब्रह्मज्ञानाविषयीची शास्त्राज्ञा पण ती मोडून जो पोटासाठी सर्रास सर्वांना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व महंत असून पराधीन होऊन राहतो, तो पढतमूर्खच असतो. (३६)

भक्तिमार्ग अवघा मोडे । आपणामध्यें उपंढर पडे ।
ऐसिये कर्मीं पवाडे । तो येक पढतमूर्ख ॥ ३७ ॥

जी कर्मे केली असता भक्तिमार्गात विघ्न येते आणि स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होऊन जाते अशी कर्मे करण्यास जो मागेपुढे पाहात नाही, तो पढतमूर्ख जाणावा. (३७)

प्रपंच गेला हातीचा । लेश नाहीं परमार्थाचा ।
द्वेषी देवां ब्राह्मणाचा । तो येक पढतमूर्ख ॥ ३८ ॥

हातचा प्रपंचही गेला व अंतःकरणात परमार्थाचा लेशही नाही, असा जो देवा-ब्राह्मणांचा द्वेष करतो, तो पढतमूर्ख होय. (३८)

त्यागावया अवगुण । बोलिलें पढतमूर्खाचें लक्षण ।
विचक्षणें नी‍उन पूर्ण । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ३९ ॥

लोकांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून पढतमूर्खाची लक्षणे वर्णन केली आहेत. विचारवंतांनी त्यातील न्यून असेल ते पूर्ण करून घ्यावे व मला क्षमा करावी. (३९)

परम मूर्खामाजी मूर्ख । जो संसारीं मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख । आणीक नाहीं ॥ ४० ॥

या संसारात जो सुख मानतो तो परम मूर्खामध्येही मूर्ख असतो. या संसारदुखाएवढे दुःख आणखी कुठलेही नाही. (४०)

तेंचि पुढें निरूपण । जन्मदुःखाचें लक्षण ।
गर्भवास हा दारुण । पुढें निरोपिला ॥ ४१ ॥

येथून पुढे त्याचेच वर्णन केले आहे. जन्म घेतल्यावर सोसावे लागणारे दुःख व गर्भवासाचे दारुण दुःख पुढे वर्णिले आहे (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पढतमूर्खलक्षणनाम समास दहावा ॥ १० ॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘पढतमूर्खलक्षणनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त दशक दुसरा समाप्त

॥ दशक दुसरा समाप्त ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम

समास पहिला : जन्मदुःख निरूपण

॥ श्रीराम ॥

जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर ।
जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १॥

श्री समर्थ म्हणतात की, जन्म हा दुःखरूपी वृक्षाचा अंकुर म्हणजे आरंभ. जन्म झाला की दुःखाला सुरुवातच होते. जन्म शोकाचा समुद्र असून भयाचा कधीही न हलणारा असा डोंगर आहे. (१)

जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी ।
जन्म काळाची जाचणी । निच नवी ॥ २॥

जन्म म्हणजे कर्माची मूस आहे. कारण जन्मापासूनच कर्म पाठीस लागते. जन्म ही पातकाची खाण आहे. जन्म ही नित्यनूतन काळाची जाचणी आहे. कारण जन्माला आल्यापासून काळाचे भय सदा मागे लागलेलेच असते. (२)

जन्म कुविद्येचें फळ । जन्म लोभाचें कमळ ।
जन्म भ्रांतीचें पडळ । ज्ञानहीन ॥ ३॥

जन्म हे कुविद्येचे फळ आहे असे म्हणण्याचे कारण वासनेमुळेच जन्म घ्यावा लागतो. जन्मास लोभाचे कमळ म्हटले आहे. लोभ म्हणजे आसक्ती. आसक्तिरूपी कमळातच जीवरूपी भ्रमर गुंतून पडतो. जन्म हे भ्रांतीचे पडळ आहे. कारण जन्म होताच स्वस्वरूपाचे विस्मरणरूपी अज्ञान उत्पन होते. (३)

जन्म जिवासी बंधन । जन्म मृत्यासी कारण ।
जन्म हेंचि अकारण । गथागोवी ॥ ४॥

जन्म होताच मी देह हे विपरीत ज्ञान बुद्धीस व्यापते व वास्तविक मुक्त असून जीव आपल्याला बद्ध समजू लागतो. तसा देहाचा जन्म म्हणजे अकारणच मायेत गुरफटणे होय. (४)

जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर ।
जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५॥

जन्म होताच स्वस्वरूपाचा विसर पडतो. तोच सुखाचा विसर होय. मी देह ही भावना दृढ होताच एकामागोमाग एक चिंता त्या जीवास व्यापून टाकतात, म्हणून जन्म म्हणजे चिंतेचे आगर म्हटले असून जन्मच मुळी वासनेमुळे होतो आणि त्यानंतर वासनांची सतत वृद्धीच होत जाते. (५)

जन्म जीवाची आवदसा । जन्म कल्पनेचा ठसा ।
जन्म लांवेचा वळसा । ममतारूप ॥ ६॥

जन्म होताच जीवाचे स्वस्वरूपज्ञान लोपते हे एक प्रकारे त्याचे अधःपतनच असते. जन्म होताच मी देह या कल्पनेचा ठसा बुद्धीवरउमटतो आणि मग ममतारूप डाकीण त्याला झपाटून टाकते. (६)

जन्म मायेचे मैंदावें । जन्म क्रोधाचें विरावें ।
जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७॥

जन्म म्हणजे मायेचे कपट होय. जन्म म्हणजे क्रोधाचे वीरपण होय. जन्म मोक्षाच्या मार्गात आडवे येणारे विघ्नच आहे. (७)

जन्म जिवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण ।
जन्म हेंचि विस्मरण । ईश्वराचें ॥ ८॥

देहाचा जन्म होताच मी देह हा अहंकार उत्पन होतो, म्हणजे अहंता तेव्हापासून आपला प्रभाव गाजवू लागते आणि गर्भात असताना च्या जीवास ईश्वराचे स्मरण असते, त्यास जन्मताक्षणी त्याचा पूर्ण विसर पडतो. (८)

जन्म विषयांची आवडी । जन्म दुराशेची बेडी ।
जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९॥

जन्म होताच विषयांची आवड उत्पन्न होते, इंद्रियांनी विषयोपभोग घेतले असता सुख लाभेल अशी दुराशेची बेडी हातापायात पडते. काळ म्हणजे मृत्यू. काकडी खावी तसा काळ या शरीरास कधी नष्ट करील, हे सांगता येत नाही. (९)

जन्म हाचि विषमकाळ । जन्म हेंचि वोखटी वेळ ।
जन्म हा अति कुश्चीळ । नर्कपतन ॥ १०॥

जन्मकाळ हाच वाईट काळ असून ती वेळ फार कठीण, प्राणसंकटाची असते. जन्म फार घाणेरडा असून ते नरकात पडणेच समजावे. (१०)

पाहातां शरीराचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ ।
रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥ ११॥

या देहाची उत्पत्ती कशी होते, याचा विचार करू लागल्यास या देहासारखे अमंगळ काही नाही अशी खात्री पटते. रजस्वलेच्या विटाळामध्ये याचा जन्म होतो. (११)

अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा ।
तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवी घडे ॥ १२॥

ज्या विटाळास अत्यंत अमंगळ, दोषास्पद मानतात, त्या विटाळाचाच पुतळा म्हणजे हा देह होय. असा मुळातच जो अमंगळ, त्याला निर्मळ करण्याचा खयटोप केला, तरी तो कसा सफल होणार ? (१२)

रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोन जाला गाळ ।
त्या गळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३॥

रजस्वलेचा विटाळ आटून त्याचा जो गाळ बनतो, त्या गाळाचेच हे शरीर बनते. (१३)

वरी वरी दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नर्काचें ।
जैसें झांकणें चर्मकुंडाचें । उघडितांच नये ॥ १४॥

ते वरवर सुरेख दिसते, पण वास्तविक ते आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे. चांभाराच्या चर्मकुंडाचे झाकण काढायची ज्याप्रमाणे सोयच नसते, तशीच या शरीराची स्थिती आहे. (१४)

कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यईं धु‍ईजेतें ।
तरी दुर्गंधी देहातें । शुद्धता न ये ॥ १५॥

ते चर्मकुंड धुऊन काढले असता स्वच्छ होऊ शकते पण या देहाला दररोज कितीही धुऊन काढले तरी दुर्गंधीने भरलेला हा देह निर्मळ होतच नाही. (१५)

अस्तीपंजर उभविला । सीरानाडीं गुंडाळिला ।
मेदमांसें सरसाविला । सांदोसाअंदीं भरूनी ॥ १६॥

हाडांचा सापळा उभा केला, तो शिरा नाड्या यांनी गुंडाळला आणि प्रत्येक सांध्यामध्ये चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगवला. असा हा देह तयार होतो. (१६)

अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंहि भरलें असे देहीं ।
नाना व्याधी दुःखें तेंहि । अभ्यांतरी वसती ॥ १७॥

रक्त म्हणजे ‘अशुद्ध’ अर्थात जे शुद्ध नाही, तेही या शरीरात भरलेले असते. शिवाय या शरीरात नाना व्याधी दुःखे भरलेली असतात. (१७)

नर्काचें कोठार भरलें । आंतबाहेरी लिडीबिडिलें ।
मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधीचें ॥ १८॥

शरीर म्हणजे आतबाहेर घाणीने लडबडलेले व नर्काचे कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवीच आहे. (१८)

जंत किडे आणी आंतडी । नाना दुर्गंधीची पोतडी ।
अमुप लवथविती कातडी । कांटाळवाणी ॥ १९॥

शरीरात जैत, किडे वळवळत असतात आणि नाना प्रकारच्या दुर्गंधीची पोतडी म्हणजे यातील आतडी होत. शरीरात अनेक कंटाळवाणी गलिच्छ कातडी लोंबत असतात. (१९)

सर्वांगास सिर प्रमाण । तेथें बळसें वाहे घ्राण ।
उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधी नेघवे ॥ २०॥

शरीरात शिर म्हणजे मस्तक हे श्रेष्ठ म्हणतात. त्याला उत्तमांग म्हणतात, पण तेथे नाकांतून शेंबूड वाहात असतो आणि कान फुटला असता जी दुर्गंधी त्या घाणीमुळे सुटते ती तर सहनच होत नाही. (२०)

डोळां निघती चिपडें । नाकीं दाटतीं मेकडें ।
प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥२१॥

डोळ्यांत चिपडे येतात, नाकांत मेकडे गर्दी करतात, सेज प्रातःकाळी तोंडातून मळासारखी घाण बाहेर पडते. (२१)

लाळ थुंका आणी मळ । पीत श्लेष्मा प्रबळ ।
तयास म्हणती मुखकमळ । चंद्रासारिखें ॥ २२॥

ज्या तोंडामध्ये लाळ, थुंकी आणि इतर घाण, तसेच पित्त, कफ यासारखी प्रबळ घाण भरलेली असते, त्याला मुखकमळ चंद्रासारखे आहे, असे म्हणतात. (२२)

मुख ऐसें कुश्चीळ दिसे । पोटीं विष्ठा भरली असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । भूमंडळीं ॥ २३॥

तोंड असे घाणेरडे असते, तर पोटात विष्ठा भरलेली असते. या गोष्टी जगात प्रत्यक्षच आहेत. त्यांना दुसरे प्रमाण देण्याची जरुरी नाही. (२३)

पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्ठा कांहीं वमन ।
भागीरथीचें घेतां जीवन । त्याची कोये लघुशंका ॥ २४॥

पोटात जरी काही मिष्टान्न, दिव्यान्न घातले तरी त्यातील काहीची विष्ठा होते, तर कधी कधी काही ओकूनही पडते. जरी अगदी गंगाजलप्राशन केले तरी त्याचे मूत्रच बनते. (२४)

एवं मळ मूत्र आणी वमन । हेंचि देहाचें जीवन ।
येणेंचि देह वाढे जाण । यदर्थीं संशय नाहीं ॥ २५॥

थोडक्यात, मल मूत्र आणि ओक हे देहाचे जीवन असून त्यांनीच देहाचे पोषण होते, याबद्दल संशय नाही. (२५)

पोटीं नस्तां मळ मूत्र वोक । मरोन जाती सकळ लोक ।
जाला राव अथवा रंक । पोटीं विष्ठा चुकेना ॥ २६॥

जर पोटात याप्रमाणे मल, मूत्र, ओक नसतील, तर सर्व लोक मरून जातील. राव असो वा रंक असो, त्याच्या पोटात विष्ठा असतेच असते. ती चुकत नाही. (२६)

निर्मळपणें काढूं जातां । तरी देह पडेल तत्वतां ।
एवं देहाची वेवस्था । ऐसी असे ॥ २७॥

स्वच्छ करण्यासाठी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर देह मरून जाईल या देहाची अवस्था ही अशी असते. (२७)

ऐसा हा धड असतां । येथाभूत पाहों जातां ।
मग ते दुर्दशा सांगतां । शंका बाधी ॥ २८॥

जो पर्यंत देह धडधाकट असतो तोपर्यंत देहाची कशी अवस्था असते, हे इत्यंभूत सांगितले तरी खरे वाटत नाही व देह खरेच असा घाणेरडा आहे का, अशी शंका मनात येते. (२८)

ऐसिये कारागृहीं वस्ती । नवमास बहु विपत्ती ।
नवहि द्वारें निरोधती । वायो कैंचा तेथें ॥ २९॥

अशा या देहरूपी कारागृहात वस्तीला आल्यामुळे जीवाला नऊ महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयात वायू नसतो. त्यामुळे देहातील नऊ द्वारे (दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन भोके, तोंड गुद आणि उपस्थ) रोधली जातात. (२९)

वोका नरकाचे रस झिरपती । ते जठराग्नीस्तव तापती ।
तेणें सर्वहि उकडती । अस्तिमांस ॥ ३०॥

आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यातून पाणी झिरपते, रस झिरपतात, ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे गर्भाच्या अस्थी व मांस उकडून निघतात. (३०)

त्वचेविण गर्भ खोळे । तंव मातेसी होती डोहळे ।
कटवतिक्षणें सर्वांग पोळे । तया बाळकाचें ॥ ३१॥

गर्भाला त्वचा नसते, तो नुसता मांसपिंड खोळीत असतो. तो हालचाल करू लागतो, तेव्हा मातेला डोहाळे लागतात. ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते, त्यामुळे त्या गर्भातील बालकाचे सर्वांग होरपळते. (३१)

बांधलें चर्माचें मोटाळें । तेथें विष्ठेचें पेटाळें ।
रसौपाय वंकनाळें । होत असे ॥ ३२॥

गर्भ म्हणजे चामड्याचे बांधलेले गाठोडे व आत विष्ठेचे पोतडे असते. नाभीपासून निघणाऱ्या नाळेच्याद्वारे जगण्यास आवश्यक असणारे रस त्याला मिळतात. (३२)

विष्ठा मूत्र वांती पीत । नाकीं तोंडीं निघती जंत ।
तेणें निर्बुजलें चित्त । आतिशयेंसीं ॥ ३३॥

मल मूत्र, ओक आणि पित्त यांच्यामुळे नाकातोंडातून जंतू बाहेर पडतात. त्यामुळे त्या गर्भातील जीव अतिशय घाबरतो. (३३)

ऐसिये कारागृहीं प्राणी । पडिला अत्यंत दाटणीं ।
कळवळोन म्हणे चक्रपाणी । सोडवीं येथून आतां ॥ ३४॥

अशा या कैदखान्यात तो जीव अत्यंत अडचणीत सापडतो. त्यावेळी तो जीव कळवळून म्हणू लागतो की, ‘हे चक्रपाणी, मला आता येथून सोडव.’ (३४)

देवा सोडविसी येथून । तरी मी स्वहित करीन ।
गर्भवास हा चुकवीन । पुन्हां न ये येथें ॥ ३५॥

हे देवा, जर तू आत्ता मला येथून सोडवशील, तर मी स्वतःचे हित करून घेईन आणि गर्भवास चुकवीन. पुन्हा येथे येणार नाही. (३५)

ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली । तंव जन्मवेळ पुढें आली ।
माता आक्रंदों लागली । प्रसूतकाळीं ॥ ३६॥

दुःखाने कासावीस होऊन जीव अशी प्रतिज्ञा करतो, तोच जन्मवेळ जवळ आलेली असते आणि प्रसूतीची वेळ आल्याने त्या वेदनांनी आई आरडाओरडा करू लागते. (३६)

नाकीं तोंडीं बैसलें मांस । मस्तकद्वारें सांडी स्वास ।
तेंहि बुजलें निशेष । जन्मकाळीं ॥ ३७॥

पोराच्या नाकातोंडात मांस घट्ट बसल्याने ते मस्तकावरील टाळूच्या छिद्राद्वारे श्वासोच्छवास करू लागते. पण ते छिद्रही जन्मकाळी बुजून जाते. (३७)

मस्तकद्वार तें बुजलें । तेणें चित्त निर्बुजलें ।
प्राणी तळमळूं लागलें । चहूंकडे ॥ ३८॥

टळूचे छिद्र बंद झाल्याने त्या पोराचा जीव घाबरा होऊन तो तळमळून चहूकडे हळू लागतो. (३८)

स्वास उस्वास कोंडला । तेणें प्राणी जाजावला ।
मार्ग दिसेनासा जाला । कासावीस ॥ ३९॥

श्वासोच्छवास कोंडला गेल्यामुळे तो जीव त्रासतो, पण मार्गच नसल्यामुळे तो कासावीस होतो. (३९)

चित्त बहु निर्बुजलें । तेणें आडभरीं भरलें ।
लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ ४०॥

अतिशय घाबरून मूल बाहेर येण्यासाठी धडपडू लागले, पण ते भलत्याच जागी अडकून आडवे झाले. तेव्हा लोक म्हणू लागले की, ‘ अरे मूल आडवे आले आहे, तर आता त्याला कापून त्याचे तुकडे करूनच काढा.’ (४०)

मग ते खांडून काढिती । हस्तपाद छेदून घेती ।
हातां पडिलें तेंचि कापिती । मुख नासिक उदर ॥ ४१॥

मग त्या मुलाचे हात, पाय, किंवा तोंड नाक पोट वगैरे जे अवयव हाताला सापडतील, ते कापून काढले जातात. (४१)

ऐसे टवके तोडिले । बाळकें प्राण सोडिले ।
मातेनेंहि सांडिलें । कळिवर ॥ ४२॥

अशा प्रकारे त्या बालकाचे टवके तोडून काढताक्षणी ते बालक प्राण सोडते. एवढेच नव्हे तर या सगळ्या खटपटीत माताही देहाचा त्याग करते. (४२)

मृत्य पावला आपण । मतेचा घेतला प्राण ।
दुःख भोगिलें दारुण । गर्भवासीं ॥ ४३॥

याप्रमाणे ते बालक स्वत: मृत्यू पावते व आईचाही प्राण जातो. गर्भवासात त्या जीवाला भयंकर दुःख भोगावे लागते. (४३)

तथापी सुकृतेंकरूनी । मार्ग सांपडला योनी ।
तर्ह्हीं आडकला जाउनी । कंठस्कंदीं मागुता ॥ ४४॥

तथापि जर पूर्वपुण्याईच्या योगे त्याला योनीतून बाहेर येण्याचा सरळ मार्ग सापडला, तरी त्याची मान, खांदा वगैरे एखादा अवयव त्या संकुचित मार्गात अडकून बसतो. (अ)

तये संकोचित पंथीं । बळेंचि वोढून काढिती ।
तेणें गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५॥

मग त्या संकुचित मार्गातून त्याला बळेच ओढून बाहेर काढतात. त्यायोगेही त्या बालकाचे प्राण कधी कधी जातात. (४५)

बाळकाचे जातां प्राण । अंतीं होये विस्मरण ।
तेणें पूर्वील स्मरण । विसरोन गेला ॥ ४६॥

बालकाचे प्राण जाऊ लागले की, त्या अंतसमयी परमेश्वराचे विस्मरण होऊन पूर्वीच्या सर्व गोष्टी तो विसरून जातो. (४६)

गर्भीं म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं ।
ऐसा कष्टी जाला बहु । गर्भवासीं ॥ ४७॥

गर्भात असताना स्वस्वरूपाचे ज्ञान असल्याने तो जीव ‘ सोहं सोहं ‘ म्हणजे मी तोच आहे, म्हणजे मी ब्रह्मच आहे, असे म्हणत असतो, पण बाहेर पडला की ‘कोहं’ म्हणजे मी कोण आहे असे म्हणू लागतो. अर्थात त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण होते. (४७)

दुःखा वरपडा होता जाला । थोरा कष्टीं बाहेरी आला ।
सवेंच कष्ट विसरला । गर्भवासाचे ॥ ४८॥

गर्भात असताना दुःखी असलेला तो जीव तेथून मोठ्या कष्टाने बाहेर येतो. पण बाहेर येताच गर्भवासातील सर्व कष्ट तो पार विसरून जातो. (४८)

सुंन्याकार जाली वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं ।
अज्ञानें पडिली भ्रांती । तेणें सुखचि मानिलें ॥ ४९॥

त्याची वृत्ती शून्याकार होऊन त्याला चित्तात काहीच आठवेनासे होते आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन जन्मलेल्या बालकाला सुखच वाटू लागते. (४९)

देह विकार पावलें । सुखदुःखें झळंबळे ।
असो ऐसें गुंडाळलें । मायाजाळीं ॥ ५०॥

त्याचा देह विकार पावू लागतो. त्याची वाढ होऊ लागली की, तो जीव सुख-दुःखाने व्याप्त होतो. असो. यप्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यात सापडून बद्ध होतो. (५०)

ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणीमात्रांसीं ।
म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१॥

प्रत्येक प्राणिमात्राला गर्भवासात असे दारुण दुःख भोगावे लागते. म्हणून त्याने भगवंतास शरण जावे. (५१)

जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त ।
ज्ञानबळें बिरक्त । सर्वकाळ ॥ ५२॥

जो भगवंताचा भक्त असतो, तो या जन्ममरणाच्या चक्रातून आपल्या विरक्तीच्या आणि ज्ञानाच्या बळावर कायमचा मुक्त होतो. त्याला पुनर्जन्म नसतो. (५२)

ऐशा गर्भवासीं विपत्ती । निरोपिल्या येथामती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ५३॥

श्रीसमर्थ म्हणतात की, याप्रमाणे गर्भवासातील दुःखाचे मी यथामती वर्णन येथे केले आहे. आता पुढे जे काही सांगणार आहे, त्याकडे श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे. (५३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
जन्मदुःखनिरूपणनाम समास पहिला ॥ १॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘जन्मदुःखनिरूपणनाम’ समास पहिला समाप्त.

समास दुसरा : स्वगुणपरीक्षा (अ)

॥ श्रीराम ॥

संसार हाचि दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
मागां बोलिली तळमळ । गर्भवासाची ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, हा संसारच मुळी दुःखाचे मूळ आहे. यात दुःखाची इंगळी लागते, तेव्हा तिच्या डंखाने प्राणांतिक वेदना होतात. मागील समासात गर्भवासात ज्या यातना सोसाव्या लागतात, त्याचे वर्णन केले होते. (१)

गर्भवासीं दुःख जालें । तें बाळक विसरलें ।
पुढें वाढों लागलें । दिवसेंदिवस ॥ २॥

पण गर्भवासात जे दुःख भोगलेले असते त्याचा त्या बालकास विसर पडतो आणि पुढे ते दिवसेंदिवस वाढू लागते. (२)

बाळपणीं त्वचा कोंवळी । दुःख होतांचि तळमळी ।
वाचा नाहीं तये काळीं । सुखदुःख सांगावया ॥ ३॥

बाळपणी त्याची त्वचा फार कोवळी असते. त्यामुळे जरा काही दुःख झाले की ते तळमळू लागते आणि सुखदुःख सांगावे म्हटले तर त्यावेळी त्याला बोलताही येत नसते. (३)

देहास कांहीं दुःख जालें । अथवा क्षुधेनें पीडलें ।
तरी तें परम आक्रंदलें । परी अंतर नेणवे ॥ ४॥

देहाला काही दुःख झाले अथवा भुकेने व्याकूळ झाले, तरी ते बालक मोठमोठ्याने रडू लागते, पण आपली आतली व्यथा त्याला सांगता येत नाही. (४)

माता कुरवाळी वरी । परी जे पीडा जाली अंतरीं ।
ते मायेसी न कळे अभ्यांतरीं । दुःख होये बाळकासीं ॥ ५॥

माता त्याला जवळ घेते, कुरवाळते, पण त्याच्या अंतरांत काय दुःख आहे, ते तीही जाणू शकत नाही. त्यामुळे त्या बालकाचे दुःख दूर होऊ शकत नाही. (५)

मागुतें मागुतें फुंजे रडे । माता बुझावी घे‍ऊन कडे ।
वेथा नेणती बापुडें । तळमळी जीवीं ॥ ६॥

ते मूल हुंदके देऊन परत परत रडते, आई त्याला कडेवर घेऊन समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्याला काय व्यथा आहे हे कुणीच जाणू शकत नाही; त्यामुळे ते मूल बिचारे तळमळत राहाते. (६)

नानाव्याधीचे उमाळे । तेणें दुःखें आंदोळे ।
रडे पडे कां पोळे । अग्निसंगें ॥ ७॥

नाना व्याधींच्या जोरामुळे ते दुःखाने भयकंपित होते. कधी ते रडते, कधी पडते, तर कधी विस्तवामुळे ते पोळतेही. (७)

शरीर रक्षितां नये । घडती नाना अपाये ।
खोडी अधांतरीं होये । आवेवहीन बाळक ॥ ८॥

त्याला स्वतःच्या शरीराचे रक्षण करता येत नाही. त्यामुळे नाना अपाय घडत असतात. खोड्या करताना अकस्मात अपाय होऊन त्याला एखादा अवयवही गमवावा लागतो. (८)

अथवा अपाय चुकले । पूर्णपुण्य पुढें ठाकलें ।
मातेस ओळखों लागलें । दिवसेंदिवस ॥ ९॥

अथवा पूर्णपुण्याईमुळे असे काही अपाय झाले नाहीत की ते मोठे होऊन हळूहळू आपल्या आईला अधिकाधिक ओळखू लागते. (९)

क्षणभरी मातेस न देखे । तरी आक्रंदें रुदन करी दुःखें ।
ते समईं मातेसारिखें । आणीक कांहिंच नाहीं ॥ १०॥

मग एक क्षणभर जरी आई दिसली नाही, तरी ते दुःखाने मोठमोठ्याने रडू लागते. त्यावेळी त्याला आईसारखे दुसरे आणखी काहीच आवडत नाही. (१०)

आस करून वास पाहे । मातेविण कदा न राहे ।
वियोग पळमात्र न साहे । स्मरण जालियां नंतरें ॥ ११॥

मोठ्या आशेने ते आईची वाट पाहात असते, आईशिवाय ते जराही राहत नाही. आईची आठवण झाली की, तिचा वियोग त्याला पळभरही सहन होत नाही. (११)

जरी ब्रह्मादिक देव आले । अथवा लक्ष्मीने अवलोकिलें ।
तरी न वचे बुझाविलें । आपले मातेवांचुनी ॥ १२॥

ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले, कितीही समजाविण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या आईला सोडून ते थोडा वेळही राहात नाही. (१२)

कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण ।
तरी नाहीं तीसमान । भूमंडळीं कोणी ॥ १३॥

आई कुरूप असो कुलक्षणी असो अथवा सगळ्यांच्यापेक्षा अभागी असो, त्या बाळाला सर्व जगात तिच्यासारखे कोणीही नसते. (१३)

ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसे उणें ।
रागें परतें केलें तिनें । तरी आक्रंदोनी मिठी घाली ॥ १४॥

आई नसेल तर ते मूल केविलवाणे, दीन दिसते. तिने रागावून त्याला दूर सारले तरी ते मोठमोठ्याने रडू लागते व धावत येऊन तिलाच मिठी मारते. (१४)

सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी ।
अतिप्रीति तयेकाळीं । मातेवरी लागली ॥ १५॥

आईच्या जवळ ते आनंदात असते. तिने दूर सारले तर ते तळमळू लागते. त्यावेळी आईवर त्याचे अतिशय प्रेम जडलेले असते. (१५)

तंव ते मातेस मरण आलें । प्राणी पोरटें जालें ।
दुःखें झुर्णीं लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६॥

अशा स्थितीत आई मरण पावली तर ते मूल अगदी पोरके होते आणि ‘आई, आई’ म्हणून दुःखाने झुरणीला लागते. (१६)

आई पाहातां दिसेना । दीनरूप पाहे जना ।
आस लागलिसे मना । आई ये‍ईल म्हणोनी ॥ १७॥

आई कुठे दिसत नाही. त्यामुळे ते केविलवाणे होऊन लोकांच्या तोंडाकडे पाहू लागते. त्याला अजून आशा वाटत असते की आपली आई जरूर परत येईल. (१७)

माता म्हणौन मुख पाहे । तंव ते आपुली माता नव्हे ।
मग हिंवासलें राहे । दैन्यवाणें ॥ १८॥

एखाद्या स्त्रीला पाहून ही आपली आई तर नाही ना, या विचाराने ते तिच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहू लागते, तेव्हा त्याला कळते की, ही आपली आई नाही. त्यामुळे ते मूल हिरमुसले होते आणि केविलवाणे दिसू लागते. (१८)

मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख जालें ।
देहहि क्षीणत्व पावलें । आतिशयेंसीं ॥ १९॥

आईच्या वियोगाने ते फार कष्टी होते. त्याला मनात अत्यंत दुःख वाटते. त्यामुळे त्याचे शरीरही अत्यंत रोडावते. (१९)

अथवा माताहि वांचली । मायलेंकुरा भेटी जाली ।
बाळदशा ते राहिली । देवसेंदिवस ॥ २०॥

मातेलाही मरण न येता ती वाचली, तरमायलेकरची भेट होते. मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही संपत येते. (२०)

बाळपण जालें उणें । दिवसेंदिवस होये शाहाणें ।
मग ते मायेचें अत्यंत पेरूणें । होतें, तें राहिलें ॥ २१॥

बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस शहाणे होऊ लागते. मग त्याला जो आईचा अत्यंत लळा लागलेला असतो, तो तितका राहात नाही. (२१)

पुढें लो लागला खेळाचा । कळप मेळविला पोरांचा ।
आल्यगेल्या डायाचा । आनंद शोक वाहे ॥ २२॥

पुढे त्याला खेळाचा नाद लागतो आणि तो मुलांचा मेळा जमवून खेळण्यात दंग होतो. डाव जिंकला तर त्याला आनंद होतो आणि डाव हरला तर दुःख वाटते. (२२)

मायेबापें सिकविती पोटें । तयाचें परम दुःख वाटे ।
चट लागली न सुटे । संगती लेंकुरांची ॥ २३॥

आईवडील अत्यंत ममतेने मनःपूर्वक त्याला शिकविण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला त्यामुळे फार दुःख होते. मुलांच्या संगतीची चटक लागलेली असते, ती सुटता सुटत नाही. (२३)

लेंकुराअंमध्यें खेळतां । नाठवे माता पिता ।
तंव तेंथेहि अवचिताअ । दुःख पावला ॥ २४॥

मुलांमध्ये खेळत असताना त्याला आईवडिलांची आठवणही होत नाही, परंतु त्या खेळण्यात अकस्मात दुःख ओढवते. (२४)

पडिले दांत फुटला डोळा । मोडले पाय जाला खुळा ।
गेला माज अवकळा- । ठाकून आली ॥ २५॥

खेळ्याना दात पडतात, डोळा फुटतो किंवा पाय मोडून तो लंगडा होतो, अगदी वेड्यासारखी त्याची अवस्था होते. त्याची सर्व मस्ती उतरते, जिरते व व्यंग आल्याने अवकळा येते. (२५)

निघाल्या देवी आणी गोवर । उठलें कपाळ लागला ज्वर ।
पोटसुळीं निरंतर । वायगोळा ॥ २६॥

त्यात त्याला देवी येतात किंवा गोवर येतो, कपाळ दुखू लागते किंवा अंगात ताप भरतो, नाही तर निरंतर वायगोळा उठून पोटशूळ लागतो. (२६)

लागलीं भूतें जाली झडपणी । जळीच्या मेसको मायेराणी ।
मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची ॥ २७॥

त्याची अवस्था पाहून लोक नाना तर्ककुतर्क करू लागतात. कुणी म्हणते की, याला भुतांनी (झपाटले) आहे, तर कुणी म्हणतात की, याला मेसको, मायेराणी या जलदेवतांनी पकडले आहे. कुणी म्हणतात की मुंज्या, झोटिंग किंवा म्हसोबाची करणी बाधली आहे. (२७)

वेताळ खंकाळ लागला । ब्रह्मगिर्ह्हो संचरला ।
नेणों चेडा वोलांडिला । कांहीं कळेना ॥ २८॥

कुणी म्हणतो की, याला दुष्ट वेताळ लागला आहे, तर कुणी म्हणते की, ब्रह्मराक्षसांनी याला धरले आहे, तर कुणी म्हणते की, कुणीतरी चेटूक केले असावे किंवा याने उतारा ओलांडला असावा. खरे काय झाले आहे, ते कळतच नाही. (२८)

येक म्हणती बीरे देव । येक म्हणती खंडेराव ।
येक म्हणती सकळ वाव । हा ब्राह्मणसमंध ॥ २९॥

कोणी म्हणतो बिरदेव लागला, तर कुणी म्हणतो खंडेराव लागला, तर दुसरा कोणी म्हणतो की हे सगळेच खोटे आहे. याला ब्रह्मसमंधच लागला आहे. (२९)

येक म्हणती कोणें केलें । आंगीं देवत घातले ।
येक म्हणती चुकलें । सटवाईचें ॥ ३०॥

एक म्हणतो की, कुणी करणी केली आहे, तर कुणी म्हणतो की, मंत्र म्हणून एखादी देवता याच्या अंगात सोडली आहे, तर कोणी म्हणतो की सटवाईचे काही देणे चुकले असावे. (३०)

येक म्हणती कर्मभोग । आंगीं जडले नाना रोग ।
वैद्य पंचाक्षरी चांग । बोलाऊन आणिले ॥ ३१॥

कुणी म्हणतात की, पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ म्हणून याच्या अंगी नाना रोग जडले आहेत. असे म्हणून कुणी चांगले वैद्य किंवा चांगले मांत्रिक यांना बोलावून आणते. (३१)

येक म्हणती हा वांचेना । येक म्हणती हा मरेना ।
भोग भोगितो यातना । पापास्तव ॥ ३२॥

कोणी म्हणतात की, आता काही हा वाचत नाही. तर दुसरे कुणी म्हणतात की हा मरत नाही. पूर्वजन्मीच्या पापांचे फळ म्हणून याला या यातना भोगाव्या लागत आहेत. (३२)

गर्भदुःख विसरला । तो त्रिविधतापें पोळला ।
प्राणी बहुत कष्टी जाला । संसारदुःखें ॥ ३३॥

माणूस गर्भवासाचे दुःख जरी विसरला तरी तो त्रिविध तापाने पोळून निघतो. या नाना प्रकारच्या संसारदुःखाने तो अत्यंत कष्टी होतो. (३३)

इतुकेंहि चुकोन वांचला । तरी मारमारूं शाहाणा केला ।
लोकिकीं नेटका जाला । नांव राखे ऐसा ॥ ३४॥

या इतक्या सगळ्या कटकटीतून माणूस जर वाचला तर त्याला विद्या यावी, म्हणून आईवडील मारमारून शहाणा करतात. लोकांत नाव राखील असा तो चांगला होतो. (३४)

पुढें मायबापीं लोभास्तव । संभ्रमें मांडिला विव्हाव ।
दाऊनियां सकळ वैभव । नोवरी पाहिली ॥ ३५॥

नंतर आईवडिलांनी संसाराच्या लोभाने त्याच्या विवाहाचा विचार केला आणि आपल्या सर्व वैभवाचे प्रदर्शन करून त्याच्यासाठी नवरी पाहिली. (३५)

वर्ह्हाडीवैभव दाटलें । देखोन परमसुख वाटले ।
मन हें रंगोन गेलें । सासुरवाडीकडे ॥ ३६॥

आपापले वैभव घेऊन सर्व वार्‍हाड्यांनी दाटी केली. ते पाहून त्या नवरदेवास फार सुख वाटले व त्याचे मन सासुरवाडीकडे अगदी रंगून गेले. (३६)

मायबापीं भलतैसें असावें । परी सासुरवाडीस नेटकें जावें ।
द्रव्य नसेल तरी घ्यावें । रुण कळांतरें ॥ ३७॥

आपले आईवडील कशाही हीनदीन अवस्थेत असले, तरी सासुरवाडीस आपण नीटनेटके गेले पाहिजे. त्यासाठी द्रव्य नसले तरी ऋण काढून व्याजाने द्रव्य घेऊन तो थाटात सासुरवाडीस जातो. (३७)

आंतर्भाव ते सासुरवाडीं । मायेबापें राहिलीं बापुडीं ।
होताती सर्वस्वें कुडकुडीं । तितुकेंच कार्य त्यांचें ॥ ३८॥

त्याचे अंतःकरण आतून सर्व सासुरवाडीकडे गुंतलेले असते. आईबाप बिचारे दीन होऊन घरात राहातात. ते सर्वस्वी असहाय्य झालेले असतात. जणू तेवढ्यासाठीच जिवंत होते आणि त्यांचे कार्य आता झाले आहे. (३८)

नोवरी आलियां घरा । अती हव्यास वाटे वरा ।
म्हणे मजसारिखा दुसरा । कोणीच नाहीं ॥ ३९॥

नवरी घरी आली की, त्या नवरदेवाला तिच्याविषयी अत्यंत आसक्ती वाटू लागते व आपल्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही, असे त्याला वाटू लागते. (३९)

मायबाप बंधु बहिणी । नोवरी न दिसतां वाटे काणी ।
अत्यंत लोधला पापिणीं । अविद्येनें भुलविला ॥ ४०॥

घरात आई-वडील, भाऊ-बहिणी सर्व असली तरी नवरी दिसली नाही तर बाकीची सर्व त्याला तुच्छ वाटू लागतात. आपल्या बायकोमध्ये तो अधिकच गुंतून जातो. पापी अविद्येने त्याला पार भुलवून ठाकले असते. (४०)

संभोग नस्तां इतुका प्रेमा । योग्य जालिया उलंघी सीमा ।
प्रीती वाढविती कामा- । करितां प्राणी गुंतला ॥ ४१॥

स्त्री वयात आली नसताही त्यास तिच्याविषयी इतके प्रेम वाटते. मग ती वयात येऊन तिच्यापासून स्त्रीसौख्य मिळू लागले म्हणजे तर त्याच्या वागण्याला मर्यादाच राहात नाही. त्यांचे एकमेकांवरील प्रेम वाढू लागते आणि कामवासनेमुळे माणूस पुरता प्रपंचात गुरफटून जातो. (४१)

जरी न देखे क्षण येक डोळां । तरी जीव होय उताविळा ।
प्रीतीपात्र अंतर्कळा । घे‍ऊन गेली ॥ ४२॥

बायको क्षणभर जरी दृष्टीआड झाली, तरी तो तिला पाहावयास अत्यंत उतावळा होतो. त्याची प्रीतिपात्र बनलेली ती पत्‍नी त्याचे अंतःकरणच जणू घेऊन जाते. (४२)

कोवळे कोवळे शब्द मंजुळ । मर्यादा लज्या मुखकमळ ।
वक्त्रलोकनें केवळ । ग्रामज्याचे मैंदावें ॥ ४३॥

तिचे ते कोमल, मंजुळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमलासारखा सुंदर चेहरा पाहिला तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते. (४३)

कळवळा येतां सांवरेना । शरीर विकळ आवरेना ।
अनेत्र वेवसाईं क्रमेना । हुरहुर वाटे ॥ ४४॥

तिच्याबद्दलची आसक्ती अनावर होते. विषयसेवनासाठी शरीर व्याकूळ बनते, ते आवरत नाही. अन्यत्र दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही, सारखी तिची हुरहुर वाटत राहते. (४४)

वेवसाय करितां बाहेरी । मन लागलेंसे घरीं ।
क्षणाक्षणां अभ्यांतरीं । स्मरण होये कामिनीचें ॥ ४५॥

बाहेर काही व्यवसाय करीत असला तरी त्याचे मन सर्वस्वी घरी लागलेले असते. क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या कामिनीचे स्मरण त्याला होत असते. (४५)

तुम्हीं माझिया जिवांतील जीव । म्हणौनी अत्यंत लाघव ।
दाऊनियां चित्त सर्व । हिरोन घेतलें ॥ ४६॥

‘तुम्ही माझ्या जीवापेक्षाही मला प्रिय आहात’ असे त्याची स्त्री अत्यंत लाघवीपणाने म्हणते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सर्व चित्त हिरावून घेते. (४६)

मैद सो‍इरीक काढिती । फांसे घालून प्राण घेती ।
तैसें आयुष्य गेलियां अंतीं । प्राणीयांस होये ॥ ४७॥

ठग किंवा पेंढारी लोक आधी ओळख काढतात आणि नंतर रुमालाचा गळफास लावून प्राण घेतात, तशी आयुष्य संपत आल्यावर माणसाची स्थिती होते. (४७)

प्रीति कामिनीसीं लागली । जरी तयेसी कोणी रागेजली ।
तरी परम क्षिती वाटली । मानसीं गुप्तरूपें ॥ ४८॥

आपल्या स्त्रीवर त्यांचे फार प्रेम जडते. तिला जरा कुणी रागाने बोलले की, मनातल्या मनात त्याला अत्यंत दुःख होते. (४८)

तये भार्येचेनि कैवारें । मायेबापासीं नीच उत्तरें ।
बोलोनियां तिरस्कारें । वेगळा निघे । ४९॥

आपल्या बायकोचा कैवार घेऊन तो आईवडिलांना शिवीगाळ करतो, वाईट शब्दांत प्रत्युत्तर देतो, तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळा निघतो. (४९)

स्त्रीकारणें लाज सांडिली । स्त्रीकारणें सखीं सोडिलीं ।
स्त्रीकारणें विघडिलीं । सकळहि जिवलगें ॥ ५०॥

स्त्रीसाठी तो लाजलज्जा सोडतो. तिच्याकरता मित्रांना सोडतो. एवढेच नव्हे तर तिच्याखातर सर्व जिवलगांशी असलेले चांगले संबंध तो बिघडवून टकतो. (५०)

स्त्रीकारणें देह विकिला । स्त्रीकारणें सेवक जाला ।
स्त्रीकारणें सांडविला । विवेकासी ॥ ५१॥

स्त्रीकरिता जणू तो आपला देहही विकतो. तिचा सेवक होऊन राहतो. स्त्रीकरिता तो विवेकालाही मुकतो. (५१)

स्त्रीकारणें लोलंगता । स्त्रीकारणें अतिनम्रता ।
स्त्रीकारणें पराधेनता । अंगिकारिली ॥ ५२॥

स्त्रीसाठी तो लंपट बनतो. तिच्यासाठीच अति नम्रता धारण करतो आणि पराधीन होऊन राहतो. (५२)

स्त्रीकारणें लोभी जाला । स्त्रीकारणें धर्म सांडिला ।
स्त्रीकारणें अंतरला । तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३॥

स्त्रीच्या योगे तो लोभी होतो, धर्माचा त्याग करतो. तीर्थयात्रा, स्वधर्म इत्यादी गोष्टी तो करू शकत नाही. (५३)

स्त्रीकारणें सर्वथा कांहीं । शुभाशुभ विचारिलें नाहीं ।
तनु मनु धनु सर्वही । अनन्यभावें अर्पिलें ॥ ५४॥

स्त्रीच्या आसक्तीमुळे तो शुभ- अशुभ याचा विचारही करीत नाही. आपले तन, मन, धन किंबहुना सर्वस्वच अनन्यभावाने तिला अर्पण करतो. (५४)

स्त्रीकारणें परमार्थ बुडविला । प्राणी स्वहितास नाडला ।
ईश्वरीं कानकोंडा जाला । स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५॥

स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला, स्वहितास मुकला, ईश्वराविषयी उदासीन झाला आणि कामासक्ती मात्र वाढली. (५५)

स्त्रीकारणें सोडिली भक्ती । स्त्रीकारणें सोडिली विरक्ती ।
स्त्रीकारणें सायोज्यमुक्ती । तेहि तुछ्य मानिली ॥ ५६॥

स्त्रीला वश होऊन त्याने भक्तीचा त्याग केला, विरक्ती सोडून दिली. एवढेच नव्हे तर जी स्वीकारण्यास योग्य ती सायुज्य मुक्तीही त्याने तुच्छ मानली. (५६)

येके स्त्रियेचेनि गुणें । ब्रह्मांड मानिलें ठेंगणें ।
जिवलगें तीं पिसुणें । ऐसीं वाटलीं ॥ ५७॥

एका स्त्रीच्या नादाने त्याने सर्व ब्रह्मांड तुच्छ मानले. प्रेमाची माणसे त्यास शत्रूसारखी वाटू लागली. (५७)

ऐसी अंतरप्रीति जडली । सार्वस्वाची सांडी केली ।
तंव ते मरोन गेली । अकस्मात ॥ ५८॥

अशा प्रकारे आपल्या पत्‍नीवर त्याचे अत्यंत अंतःकरणपूर्वक प्रेम जडल्याने त्याने तिच्यापायी सर्वस्वाचा त्याग केला. तो अकस्मात ती बायको मरूनच गेली. (५८)

तेणें मनीं शोक वाढला । म्हणे थोर घात जाला ।
आतां कैंचा बुडाला । संसार माझा ॥ ५९॥

तिच्या मृत्यूने त्याच्या मनास अत्यंत शोक झाला. तो म्हणू लागला की, ‘माझा फार मोठा घात झाला. आता कसला संसार ! माझा संसार पार बुडाला.’ (५९)

जिवलगांचा सोडिला संग । अवचिता जाला घरभंग ।
आतां करूं मायात्याग । म्हणे दुःखें ॥ ६०॥

जिवलग माणसांशी संबंध सोडून टाकला आणि आता अवचित माझे घरच मोडले ! मग तो दुःखाने म्हणू लागला की, मी आता या मायेचा त्याग करतो. (६०)

स्त्री घे‍ऊन आडवी । ऊर बडवी पोट बडवी ।
लाज सांडून गौरवी । लोकां देखतां ॥ ६१॥

स्वीचे प्रेत मांडीवर घेऊन तो ऊर व पोट बडवून घेऊ लागला आणि लाज सोडून लोकांच्यासमोर तिची थोरवी वर्णन करू लागला. (६१)

म्हणे माझें बुडालें घर । आतां न करी हा संसार ।
दुःखें आक्रंदला थोर । घोर घोषें ॥ ६२॥

तो मोठमोठ्याने दुःखाने आक्रंदू लागला आणि म्हणू लागला की, ‘माझे घर बुडाले । आता मी यापुढे संसार करणार नाही !’ (६२)

तेणें जीव वारयावेघला । सर्वस्वाचा उबग आला ।
तेणें दुःखें जाला । जोगी कां महात्मा ॥ ६३॥

भ्रमिष्ट झालेल्या माणसासारखी त्याची स्थिती झाली. त्याला सर्वस्वाचा उबग आला. त्या दुःखामुळे तो अंगाला राख फासून साधू-बैसगी बनला. (६३)

कां तें निघोन जाणें चुकलें । पुन्हां मागुतें लग्न केलें ।
तेणें अत्यंतचि मग्न जालें । मन द्वितीय संमंधीं ॥ ६४॥

पण काही कारणाने घरातून निघून जाणे जमले नाही आणि शेवटी त्याने पुन्हा लग्न केले. त्यानंतर त्या दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अत्यंत आसक्त झाले. (६४)

जाला द्वितीय संमंध । सवेंचि मांडिला आनंद ।
श्रोतीं व्हावें सावध । पुढिले समासीं ॥ ६५॥

दुसरे लग्न झाल्यावर लगेच त्याच्या आनंदाला भरती आली. श्रीसमर्थ म्हणतात की, आता पुढला समास ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे. (६५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास दुसरा ॥ २॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘स्वगुणपरीक्षा (अ) नाम’ समास दुसरा समाप्त.

समास तिसरा : स्वगुणपरीक्षा (ब)

॥ श्रीराम ॥

द्वितीय संमंध जाला । दुःख मागील विसरला ।
सुख मानून राहिला । संसाराचें ॥ १॥

दुसरा विवाह होताच मागील दुःख तो विसरून गेला आणि संसारात सुख आहे असे मानून दिवस घालवू लागला. (१)

जाला अत्यंत कृपण । पोटें न खाय अन्न ।
रुक्याकारणें सांडी प्राण । येकसरा ॥ २॥

आता तो अत्यंत कंजूष झाला. पोटभर अन्न देखील खाईना. पै-पैशासाठी एकाएकी प्राण टाकू लागला. (२)

कदा कल्पांतीं न वेची । सांचिलेंचि पुन्हा सांची ।
अंतरीं असेल कैंची । सद्वासना ॥ ३॥

प्रलय ओढवला तरी पैसे खर्च करीनासा झाला. साठविलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतरात सद्‌वासना राहील तरी कशी ? (३)

स्वयें धर्म न करी । धर्मकर्त्यासहि वारी ।
सर्वकाळ निंदा करी । साधुजनाची ॥ ४॥

स्वत: धर्म करीना व इतर कुणी धर्म करू लागले, तर त्याचे निवारण करू लागला. साधु-सज्जनांची सर्वकाळ निंदा करू लागला. (४)

नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतित अभ्यागत ।
मुंगीमुखींचें जें सीत । तेंही वेंचून सांची ॥ ५॥

तीर्थयात्रा नाही, व्रत नाही की अतिथी अभ्यागत नाही, अशी त्याची वृत्ती झाली. मुंगीच्या तोंडातील अन्नाचा कणही तो वेचून साठवू लागला. (५)

स्वयें पुण्य करवेना । केलें तरी देखवेना ।
उपहास्य करी मना- । नये म्हणौनी ॥ ६॥

स्वतःच्या हातून पुण्य करवत नाही. दुसऱ्या कुणी केले तर ते पाहवत नाही. आपल्याला आवडत नाही म्हणून जो कुणी करीत असेल त्याचा उपहास करू लागला. (६)

देवां भक्तांस उछेदी । आंगबळें सकळांस खेदी ।
निष्ठुर शब्दें अंतर भेदी । प्राणीमात्रांचें ॥ ७॥

देवाला, भक्तांना त्रास देऊ लागला. आपल्या शक्तीच्या बळावर सगळ्यांना दुःख देऊ लागला. प्राणिमात्रास निष्ठुर शब्द बोलून त्याचे अंतःकरण दुखवू लागला. (७)

नीति सांडून मागें । अनीतीनें वर्तों लागे ।
गर्व धरून फुगे । सर्वकाळ ॥ ८॥

नीतीचा त्याग करून तो अनीतीने वागू लागला आणि सदासर्वदा अभिमान धरून ताठ्याने वागू लागला. (८)

पूर्वजांस सिंतरिलें । पक्षश्राद्धहि नाहीं केलें ।
कुळदैवत ठकिलें । कोणेपरी ॥ ९॥

तो पक्ष-श्राद्धही करीना. याप्रकारे त्याने आपल्या पूर्वजांनाही फसविले. काही तरी सबब शोधून तो कुळधर्म, कुळाचारही करीना. याप्रकारे त्याने कुळदेवतेलाही ठकविले. (९)

आक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा ।
आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ॥ १०॥

तो बहिणीलाच सवाष्ण म्हणून आमंत्रण देई आणि बायकोला बोलवायला आलेल्या मेहुण्यासच ब्राह्मण सांगून पाहुण्यांच्यावरच भागवू लागला आणि त्यामुळे इतर दोघांचा भोजनखर्च वाचवू लागला. (१०)

कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा ।
स्नानसंध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ ११॥

त्याला हरिकथा कधीच आवडत नसे. देवाची काय आवश्यकता आहे, असे त्याला वाटे उगीचच स्नानसंध्या तरी का म्हणून करावी ? असे तो म्हणू लागला. (११)

अभिळाषें सांची वित्त । स्वयें करी विस्वासघात ।
मदें मातला उन्मत्त । तारुण्यपणें ॥ १२॥

अभिलाषा धरून तो द्रव्यसंचय करू लागला. स्वत: दुसऱ्याचा विश्वासघात करू लागला आणि तारुण्याच्या मदाने माजून अत्यंत उन्मत्तपणे वागू लागला. (१२)

तारुण्य आंगीं भरलें । धारिष्ट न वचे धरिलें ।
करूं नयें तेंचि केलें । माहापाप ॥ १३॥

तारुण्याच्या जोरामुळे कामवासना उत्पन्न झाली. मनोधैर्य टिकणे अशक्य झाले आणि जे करू नये ते महापाप त्याने केले. (१३)

स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवेचि पोटीं ।
विषयलोभें सेवटीं । वोळखी सांडिली ॥ १४॥

स्त्री केली होती पण वयात आलेली नव्हती आणि याला तर धीर धरवेना. शेवटी विषयसुखाच्या लोभाने कुणाला ओळखेनासा झाला. (१४)

माये बहिण न विचारी । जाला पापी परद्वारी ।
दंड पावला राजद्वारीं । तर्ह्हीं पालटेना ॥ १५॥

आई-बहिणीप्रमाणे परस्त्रीशी वागावे, हा विचार राहिला नाही आणि परस्त्रीशी संबंध ठेवल्याने पातकी ठरला. त्यामुळे न्यायालयात त्याला शिक्षा झाली, तरी त्याचे वागणे पालटले नाही. (१५)

परस्त्री देखोनि दृष्टीं । अभिळाष उठे पोटीं ।
अकर्तव्यें हिंपुटी । पुन्हां होये ॥ १६॥

परस्त्री दृष्टीस पडताच त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होऊ लागली. पण तिची प्राप्ती होत नाही, असे पाहून तो पुन्हा कष्टी होऊ लागला. (१६)

ऐसें पाप उदंड केलें । शुभाशुभ नाहीं उरलें ।
तेणें दोषें दुःख भरलें । अकस्मात आंगीं ॥ १७॥

अशा रीतीने त्याने उदंड पाप केले. शुभाशुभाचा विचारही त्याच्या ठिकाणी राहिला नाही. त्या दोषामुळे अकस्मात त्याच्या अंगी दुःख भरले. (१७)

व्याधी भरली सर्वांगीं । प्राणी जाला क्षयरोगी ।
केले दोष आपुले भोगी । सीघ्र काळें ॥ १८॥

त्याच्या सर्व शरीरात रोग पसरला. त्याला क्षयरोग लागला. त्याने केलेल्या दोषांची फळे भोगण्याची पाळी लवकरच त्याच्यावर आली. (१८)

दुःखें सर्वांग फुटलें । नासिक अवघेंचि बैसलें ।
लक्षण जाऊन जालें । कुलक्षण ॥ १९॥

रोगाने त्याच्या सर्वांगावर फोड उठले, नाक झडून गेले आणि सर्व सौंदर्य जाऊन कुरूपता आली. (१९)

देहास क्षीणता आली । नाना वेथा उद्भवली ।
तारुण्यशक्ती राहिली । खंगला प्राणी ॥ २०॥

देह अगदी कृश झाला. नाना व्यथा उत्पन्न झाल्या आणि तारुण्यातील शक्ती सगळी नष्ट होऊन तो अगदी खंगून गेला. (२०)

सर्वांगीं लागल्या कळा । देहास आली अवकळा ।
प्राणी कांपे चळचळां । शक्ति नाहीं ॥ २१॥

त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या, देहाला अवकळा आली आणि अंगात शक्ती न राहिल्याने तो थरथर कापू लागला. (२१)

हस्तपादादिक झडले । सर्वांगीं किडे पडिले ।
देखोन थुंकों लागले । लाहानथोर ॥ २२॥

हात-पाय वगैरे रोगाने झडले, सर्वांगात किडे पडले. त्याच्याकडे पाहून सर्व लहान-थोर तिरस्काराने) थुंकू लागले. (२२)

जाली विष्टेची सारणी । भोवती उठली वर्ढाणी ।
अत्यंत खंगला प्राणी । जीव न वचे ॥ २३॥

त्यात त्याला जुलाब होऊ लागले. त्यामुळे आसपास दुर्गंधी सुटली. तो अत्यंत खंगून गेला. पण जीव जाता जाईना. (२३)

आतां मरण दे गा देवा । बहुत कष्ट जाले जीवा ।
जाला नाहीं नेणों ठेवा । पातकाचा ॥ २४॥

मग तो म्हणू लागला की, देवा, आता मला मरण दे. माझ्या जीवाला अत्यंत यातना झाल्या आहेत. अजून माझ्या पापांचा घडा भरला नाही का ? (२४)

दुःखें घळघळां रडे । जों जों पाहे आंगाकडे ।
तों तों दैन्यवाणें बापुडें । तळमळी जीवीं ॥ २५॥

तो दुःखाने घळघळा रडू लागला. जो जो स्वतःच्या अंगाकडे पाहावे, तो तो ते अधिकच दैन्यवाणे दिसू लागले. त्यामुळे तो बिचारा मनात तळमळू लागला. (२५)

ऐसे कष्ट जाले बहुत । सकळ जालें वाताहात ।
दरवडा घालून वित्त । चोरटीं नेलें ॥ २६॥

अशा प्रकारे त्याला खूप कष्ट झाले. सर्व वाताहात झाली. त्यात दरोडेखोरांनी दरोडा घालून सर्व द्रव्य चोरून नेले. (२६)

जालें आरत्र ना परत्र । प्रारब्ध ठाकलें विचित्र ।
आपला आपण मळमूत्र । सेविला दुःखें ॥ २७॥

याप्रमाणे ना धड इहलोक ना परलोक अशी विचित्र अवस्था झाली. प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला की, स्वतःचे मळमूत्रच दुःखाने त्याला सेवावे लागले. (२७)

पापसामग्री सरली । देवसेंदिवस वेथा हरली ।
वैद्यें औषधें दिधलीं । उपचार जाला ॥ २८॥

पुढे त्याच्या पापकर्माचा भोग सरला आणि दिवसेंदिवस त्याची व्यथा कमी होऊ लागली. वैद्याने औषधे दिली आणि त्याचा उपयोग झाला. (२८)

मरत मरत वांचला । यास पुन्हां जन्म जाला ।
लोक म्हणती पडिला । माणसांमध्यें ॥ २९॥

लोक म्हणू लागले की, हा मरता मरता वाचला आहे. याचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. आता हा जस माणसात आला आहे. (२९)

येरें स्त्री आणिली । बरवी घरवात मांडिली ।
अति स्वार्थबुद्धी धरिली । पुन्हां मागुती ॥ ३०॥

मग त्याने आपल्या स्त्रीला घरी आणली आणि परत घरात दिवा लागू लागला. पण परत त्याने पूर्वीप्रमाणेच अति स्वार्थबुद्धीच धरली. (३०)

कांहीं वैभव मेळविलें । पुन्हां सर्वही संचिलें ।
परंतु गृह बुडालें । संतान नाहीं ॥ ३१॥

काही वैभव मिळविले. परत सर्व साठवले. पण संतान नसल्याने घर बुडाल्यासारखेच त्याला वाटू लागले. (३१)

पुत्र संतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं ।
तें न फिटे म्हणोनी लेंकी । तरी हो आतां ॥ ३२॥

पुत्रसंतान झाले नाही, त्यामुळे तो दुःखी झाला. लोकांत ‘वांझ’ म्हणून नाव पडले. ते नाव जावे म्हणून ‘आता मुलगी तरी होऊ दे’ असे तो म्हणू लागला. (३२)

म्हणोन नाना सायास । बहुत देवास केले नवस ।
तीर्थें व्रतें उपवास । धरणें पारणें मांडिलें ॥ ३३॥

म्हणून त्याने नाना सायास केले. अनेक देवांना नवस केले. तीर्थयात्रा, व्रते, उपवास, धरणे, पारणे यांचा सपाटा लावला. (३३)

विषयसुख तें राहिले । वांजपणें दुःखी केलें ।
तंव तें कुळदैवत पावलें । जाली वृद्धी ॥ ३४॥

विषयसुख राहिले बाजूला, पण वांझपणाने दोघांना दुःखी केले. तेवढ्यात कुलदैवत प्रसन्न झाले आणि एकदाचे मूल झाले. (३४)

त्या लेंकुरावरी अतिप्रीति । दोघेहि क्षण येक न विशंभती ।
कांहीं जाल्या आक्रंदती । दीर्घस्वरें ॥ ३५॥

त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम जडले. दोघेही त्याला एक क्षणभरही विसंबत नसत. त्याला काही झाले तर ती जोरजोराने रडू लागत. (३५)

ऐसी ते दुःखिस्ते । पूजीत होती नाना दैवतें ।
तंव तेंहि मेलें अवचितें । पूर्व पापेंकरूनी ॥ ३६॥

अशी ती दुःखित दोघे नाना दैवतांची पूजा करीत होती, तोच पूर्वपापाच्या प्रभावाने ते मूलही अकस्मात मरण पावले. (३६)

तेणें बहुत दुःख जालें । घरीं आरंधें पडिलें ।
म्हणती आम्हांस कां ठीविलें । देवें वांज करूनी ॥ ३७॥

त्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झाले. परत घरी निपुत्रिकत्व आले. ती दोघे म्हणू लागली की, देवाने वांझ करून आम्हांला तरी कशाला ठेवले आहे ? (३७) .

आम्हांस द्रव्य काये करावें । तें जावें परी अपत्य व्हावें ।
अपत्यालागी त्यजावें । लागेल सर्व ॥ ३८॥

आम्हांला हे द्रव्य काय करायचे आहे ? हे सर्व गेले तरी चालेल पण मूल-बाळ होऊ दे. मुलासाठी सर्व सोडावे लागले तरी चालेल. (३८)

वांजपण संदिसें गेलें । तों मरतवांज नांव पडिलें ।
तें न फिटे कांहीं केलें । तेणें दुःखें आक्रंदती ॥ ३९॥

एक मूल झाल्याने वांझपण गेले होते; पण आता ते मूल गेल्याने ‘मरत वांझ’ (म्हणजे जिची मुले जगत नाहीत अशी स्त्री) नाव पडले आहे. ते नाव आता काही केल्या जात नाही, म्हणून त्या दुःखाने दोघे पुन्हा रडू लागली. (३९)

आमुची वेली कां खुंटिली । हा हा देवा वृत्ती बुडाली ।
कुळस्वामीण कां क्षोभली । विझाला कुळदीप ॥ ४०॥

आमची वंशवेली का बरेखुंटली ? हाय रे देवा, आमची वृत्ती का बरे बुडाली ? कुलस्वामिनी आमच्यावर कोपली तर नाही ना ? आमचा कुलदीप का बरे विझला ? (४०)

आतां लेंकुराचें मुख देखेन । तरी आनंदें राडी चालेन ।
आणी गळही टोंचीन । कुळस्वामिणीपासीं ॥ ४१॥

आता परत जर आम्हांला पुत्राचे मुख पाहावयास मिळाले, तर आनंदाने धगधगीत निखार्‍याच्या खाईतून चालन जाईन किंवा कुलस्वामिनीपुढे गळही टोचून घेईन. (४१)

आई भुता करीन तुझा । नांव ठेवीन केरपुंजा ।
वेसणी घालीन, माझा- । मनोरथ पुरवी । ४२॥

आई, त्या मुलाला तुझा ‘भुता’ सेवेकरी करीन. त्याचे नाव ‘केरपुंजा’ ठेवीन. त्याच्या नाकात नथणी घालीन. पण माझा एवढा मनोरथ पुरा कर (४२)

बहुत देवांस नवस केले । बहुत गोसावी धुंडिले ।
गटगटां गिळिले । सगळे विंचू ॥ ४३॥

याप्रमाणे अनेक देवांना त्यांनी नवस केले. पुष्कळ गोसावी धुंडले. सबंध विंचू गयगय गिळले (४३)

केले समंधास सायास । राहाणे घातलें बहुवस ।
केळें नारिकेळें ब्राह्मणास । अंब्रदानें दिधलीं ॥ ४४॥

समंधांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले. अंगात दैवत घालण्याचे नाना तव्हेने प्रयत्न केले ब्राह्मणांना केळी, नारळ आंबे इत्यादींची दाने दिली. (४४)

केलीं नाना कवटालें । पुत्रलोभें केलीं ढालें ।
तरी अदृष्ट फिरलें । पुत्र नाहीं ॥ ४५

नाना प्रकारचे तंत्रप्रयोग केले. पुत्रलोभाने क्षुद्र मंत्रप्रयोगही केले. तरीही नशीब फिरले आणि आणि पुत्र काही होईना. (४५)

वृक्षाअखालें जाऊन नाहाती । फळतीं झाडें करपती ।
ऐसे नाना दोष करिती । पुत्रलोभाकारणें ॥ ४६॥

पुत्र व्हावा म्हणून अस्पर्श असता वृक्षाखाली जाऊन न्हाणे, फळती झाडे जाळणे इत्यादी नाना पातके त्यांनी केली. (४६)

सोडून सकळ वैभव । त्यांचा वारयावेधला जीव ।
तंव तो पावला खंडेराव । आणी कुळस्वामिणी ॥ ४७॥

दोघांनी आपले सर्व वैभव सोडून दिले आणि त्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली. इतक्यात त्यांना खंडेराव आणि कुलस्वामिनी प्रसन्न झाली. ७)

आतां मनोरथ पुरती । स्त्रीपुरुषें आनंदती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ४८॥

आता आपले मनोरथ पूर्ण होतील, या विचाराने नवरा-बायको आनंदून गेली. श्री समर्थ म्हणतात की, आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे सांगेन ते लक्षपूर्वक ऐकावे. (४८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास तिसरा ॥ ३॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (ब) नाम’ समास तिसरा समाप्त.

समास चौथा : स्वगुणपरीक्षा (क)

॥ श्रीराम ॥

लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली ।
बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १॥

पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपून गेला. त्यामुळे त्यांना पोटभर खायला मिळेना. त्या बिचाऱ्यांवर भीक मागण्याची पाळी आली. (१)

लेंकुरें खेळती धाकुटीं । येकें रांगती येकें पोटीं ।
ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २॥

धाकटी काही मुले खेळत आहेत, कुणी रांगत आहेत तर कुणी गर्भात आहे. अशी घरभर पुत्र आणि कन्या यांची गर्दीच झाली. (२)

देवसेंदिवसा खर्च वाढला । यावा होता तो खुंटोन गेला ।
कन्या उपवरी जाल्या, त्यांला- । उजवावया द्रव्य नाहीं ॥ ३॥

दिवसेंदिवस खर्च वाढू लागला आणि आवक होती ती थांबून गेली. कन्या उपवर झाल्या पण त्यांचे विवाह करून द्यायला जवळ द्रव्य नाही, अशी स्थिती झाली. (३)

मायेबापें होतीं संपन्न । त्यांचें उदंड होतें धन ।
तेणें करितां प्रतिष्ठा मान । जनीं जाला होता ॥ ४॥

आईवडील श्रीमंत होते, त्यांच्याजवळ भरपूर धन होते. म्हणून लोकांत त्यांना चांगली प्रतिष्ठा, मान प्राप्त झाला होता. (४)

भरम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं ।
देवसेंदिवस अभ्यांतरीं । दरिद्र आलें ॥ ५॥

लोकांत अजून त्यांच्या श्रीमंतीबद्दल भ्रम होता, पण पहिली सुबत्ता घरात राहिली नव्हती. दिवसेंदिवस घरात दारिद्र्यच येत होते. (५)

ऐसी घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं ।
तेणें प्राणीयांस लागली । काळजी उद्वेगाची ॥ ६॥

अशा रीतीने घरसंसार वाढला. खाणारी माणसे वाढली. त्यामुळे त्याला उद्वेग व काळजी वाटू लागली. (६)

कन्या उपवरी जाल्या । पुत्रास नोवया आल्या ।
आतां उजवणा केल्या । पहिजेत कीं ॥ ७॥

कन्या उपवर झाल्या, पुत्रांना मुली सांगून येऊ लागल्या. आता मुलामुलींची लग्ने करायलाच हवीत, अशी परिस्थिती येऊन ठेपली. (७)

जरी मुलें तैसींच राहिलीं । तरी पुन्हां लोकलाज जाली ।
म्हणती कासया व्यालीं । जन्मदारिद्र्यें ॥ ८॥

मुले मुली लग्नाशिवाय तशीच राहिली तरी लोक नावे ठेवणारच. ते म्हणतील की, ‘हे जन्मदरिद्री होते, तर त्यांनी इतक्या मुलांना जन्म तरी कशाला दिला ?’ (८)

ऐसी लोकलाज हो‍ईल । वडिलांचें नांव जाईल ।
आतां रुण कोण दे‍ईल । लग्नापुरतें ॥ ९॥

अशा रीतीने लोकात कमीपणा येईल, वडिलांचे नाव जाईल. पण लग्ने करावीत तर लग्नापुरते कर्ज तरी कोणी देईल का, अशी काळजी उत्पन झाली. (९)

मागें रुण ज्याचें घेतलें । त्याचें परतोन नाहीं दिल्हें ।
ऐसें आभाळ कोंसळलें । उद्वेगाचें ॥ १०॥

मागे ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते, ते अद्याप परत केलेले नाही. असे निराशेचे आभाळच त्यांच्यावर कोसळले. (१०)

आपण खातों अन्नासी । अन्न खातें आपणासीं ।
सर्वकाळ मानसीं । चिंतातुर ॥ ११॥

आपण अन्न खातो खरे पण खरेतर अन्नच आपल्याला खात असते. याप्रकारे खाल्लेले अन्नही अंगी लागेना. असा तो मनात अत्यंत चिंतातुर झाला. (११)

पती अवघीच मोडली । वस्तभाव गाहाण पडिली ।
अहा देवा वेळ आली । आतां डिवाळ्याची ॥ १२॥

लोकांत जराही पत राहिली नाही. घरातील चीजवस्तू गहाण पडल्या. तो म्हणू लागला की, ‘अरे देवा, आता दिवाळखोरीची वेळ आली आहे.’ (१२)

कांहीं केला ताडामोडा । विकिला घरींचा पाडारेडा ।
कांहीं पैका रोकडा । कळांतरें काढिला ॥ १३॥

काही मोडतोड केली. घरची जनावरे विकली आणि व्याजाने काही रोकड पैसा उभा केला. (१३)

ऐसें रुण घेतलें । लोकिकीं दंभ केलें ।
सकळ म्हणती नांव राखिलें । वडिलांचें ॥ १४॥

याप्रकारे ऋण काढून लोकात खोटा मोठेपणा मिरवला. सगळे लोक म्हणू लागले की, ‘वडिलांचे नाव राखले बरं का !’ (१४)

ऐसें रुण उदंड जालें । रिणाइतीं वेढून घेतलें ।
मग प्रयाण आरंभिलें । विदेशाप्रती ॥ १५॥

अशा रीतीने खूप कर्ज झाले, तेव्हा सावकारांनी वेढून टाकले. तेव्हा त्याने विदेशी जाण्याचा विचार केला. (१५)

दोनी वरुषें बुडी मारिली । नीच सेवा अंगीकारिली ।
शरीरें आपदा भोगिली । आतिशयेंसीं ॥ १६॥

दोन वर्षे तो बेपत्ता झाला. तेथे नीच सेवा अंगीकारली आणि शरीराने अत्यंत कष्ट सोसले. (१६)

कांहीं मेळविलें विदेशीं । जीव लागला मनुष्यांपासीं ।
मग पुसोनियां स्वामीसी । मुरडता जाला ॥ १७॥

विदेशात काही द्रव्य मिळविले, पण जीव घरच्या माणसांत गुंतला होता. म्हणून मालकाची परवानगी घेऊन घराकडे परत फिरला. (१७)

तंव तें अत्यंत पीडावलीं । वाट पाहात बैसलीं ।
म्हणती दिवसगती कां लागली । काये कारणें देवा ॥ १८॥

घरी आल्यावर बघतो तर घरातील माणसे अत्यंत कष्ट भोगत असलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहात असलेली दिसली. ती म्हणत होती की, ‘देवा, त्यांना कोणत्या कारणाने घरी परतायला इतके दिवस लागले आहेत ? (१८)

आतां आम्ही काये खावें । किती उपवासीं मरावें ।
ऐसियाचे संगतीस देवें । कां पां घातलें आम्हांसी ॥ १९॥

आता आम्ही काय खावे, किती दिवस उपवास काढून मरावे ! देवाने आम्हांला अशा माणसाच्या संगतीत का बरे घातले आहे ?’ (१९)

ऐसें आपुलें सुख पाहाती । परी त्याचें दुःख नेणती ।
आणी शक्ती गेलियां अंतीं । कोणीच कामा न येती ॥ २०॥

याप्रमाणे सर्वजण आपल्या सुखाचा विचार करीत होते, पण त्याचे दुःख कुणीच जाणून घेत नव्हते आणि अंगातील शक्ती नाहीशी झाल्यावर तर शेवटी कोणीच उपयोगी पडत नाही. (२०)

असो ऐसी वाट पाहतां । दृष्टीं देखिला अवचिता ।
मुलें धावती, ताता । भागलास म्हणौनी ॥ २१॥

असो. याप्रमाणे त्याची वाट पाहात असता तो अचानक दृष्टीस पडला, तेव्हा ‘बाबा, तुम्ही किती भागलात ?’ असे म्हणत मुले त्याच्याजवळ धावत आली. (२१)

स्त्री देखोन आनंदली । म्हणे आमुची दैन्यें फिटली ।
तंव येरें दिधली । गांठोडी हातीं ॥ २२॥

बायकोने त्याला पाहिले तेव्हा तिला आनंद झाला. ती म्हणाली की, ‘ आता आमचे दैन्य फिटले !’ तेव्हा त्याने आपली पैशाची गाठोडी तिच्या हाती दिली. (२२)

सकळांस आनंद जाला । म्हणती आमुचा वडील आला ।
तेणें तरी आम्हांला । आंग्या टोप्या आणिल्या ॥ २३॥

सगळ्यांना आनंद झाला. आमचे वडील आले. त्यांनी आमच्यासाठी अंगरखे आणि टोप्या आणल्या आहेत, असे मुले म्हणू लागली. (२३)

ऐसा आनंद च्यारी देवस । सवेंच मांडिली कुसमुस ।
म्हणती हें गेलियां आम्हांस । पुन्हां आपदा लागती ॥ २४॥

पण हा आनंद चारच दिवस टिकला. मग लगेच सर्वांची कुरबुर सुरू झाली. सर्व म्हणू लागले की, आणलेला पैसा खर्च झाला की, आमचे हाल परत सुरू होतील. (२४)

म्हणौनी आणिलें तें असावें । येणें मागुतें विदेशास जावें ।
आम्ही हें खाऊं न तों यावें । द्रव्य मेळऊन ॥ २५॥

म्हणून त्यांनी जे द्रव्य वगैरे आणले आहे, ते येथेच ठेवावे व त्यांनी परत विदेशास जावे. आणि आम्ही हे खाऊन संपण्याचे आत द्रव्य मिळवून परत यावे. (२५)

ऐसी वासना सकळांची । अवघीं सो‍ईरीं सुखाचीं ।
स्त्री अत्यंत प्रीतीची । तेहि सुखाच लागली ॥ २६॥

सगळ्यांची इच्छा या प्रकारची होती. प्रपंचात सर्व नाती केवळ त्यांच्या त्यांच्या सुखापुरतीच असतात. बायको अत्यंत प्रेम करीत असली तरी ती तिच्या स्वतःच्या सुखासाठीच करीत असते. (२६)

विदेसीं बहु दगदला । विश्रांती घ्यावया आला ।
स्वासहि नाहीं टाकिला । तों जाणें वोढवलें ॥ २७॥

परदेशात त्याला खूप परिश्रम झाले होते, म्हणून खरे तर तो विश्रांती घेण्यासाठी घरी आला होता. पण घरी येऊन श्वास टाकतो न टाकतो तोपर्यंत परत जाण्याची पाळी आली. (२७)

पुढें अपेक्षा जोसियांची । केली विवंचना मुहूर्ताची ।
वृत्ति गुंतली तयाची । जातां प्रशस्त न वटे ॥ २८॥

नंतर ज्योतिष्याला विचारून जाण्यासाठी मुहूर्त शोधला, पण त्याची वृत्ती घरात गुंतली असल्याने जाणे त्याला प्रशस्त वाटेना. (२८)

माया मात्रा सिद्ध केली । कांहीं सामग्री बांधली ।
लेंकुरें दृष्टीस पाहिलीं । मार्गस्त जाला ॥ २९॥

जावयाचे म्हणून काही द्रव्य व फराळाचे साहित्य तयार केले. इतर काही सामग्रीही एकत्र बांधून घेतली, मुलाबाळाकडे डोळे भरून पाहिले आणि मार्गाला लागला. (२९)

स्त्रियेस अवलोकिलें । वियोगें दुःख बहुत वाटलें ।
प्रारब्धसूत्र तुकलें । रुणानबंधाचें ॥ ३०॥

इतक्यात बायकोकडे नजर गेली, तेव्हा वियोगाचे फार दुःख झाले. वियोगाच्या ऋणानुबंधाचे प्रारब्ध बळावल्याने इच्छेविरुद्ध जाणे भाग पडले. (३०)

कंठ सद्गसदित जाला । न संवरेच गहिवरला ।
लेंकुरा आणी पित्याला । तडातोडी जाली ॥ ३१॥

दुःखाने कंठ सद्‌गदित झाला. गहिवर आवरेनासा झाला. मुलांची आणि बापाची ताटातूट झाली. (३१)

जरी रुणानुबंध असेल । तरी मागुती भेटी हो‍ईल ।
नाहीं तरी संगती पुरेल । येचि भेटीनें तुमची ॥ ३२॥

जर ऋणानुबंध असेल, तर आपली परत भेट होईल. नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजावी. (३२)

ऐसीं बोलोन स्वार होये । मागुता फीरफिरों पाहे ।
वियोगदुःख न साहे । परंतु कांहीं न चले ॥ ३३॥

असे म्हणून तो घोड्यावर स्वार झाला, पण वारंवार मागे वळून पाहू लागला. वियोगदुःख सहन होईना, परंतु जाणे भागच पडले. दुसरा काही उपायच उरला नाही. (३३)

आपुला गांव राहिला मागें । चित्त भ्रमलें संसारौद्वेगें ।
दुःखवला प्रपंचसंगें । अभिमानास्तव ॥ ३४॥

पाहता पाहता आपला गाव मागे राहिला संसाराच्या उद्वेगाने चित्त भ्रमले. देहाभिमान धरून प्रपंचाची संगत केल्याने त्याला दुःख भोगावे लागले (३४)

ते समईं माता आठवली । म्हणे म्हणे धन्य ते माउली ।
मजकारणें बहुत कष्टली । परी मी नेणेंचि मूर्ख ॥ ३५॥

त्यावेळी त्याला आईची आठवण झाली. तो म्हणू लागला की खरोखर ती माउली धन्य. माझ्यासाठी तिने फार कष्ट सोसले पण त्यावेळी मला मूर्खाला हे कळले नाही. (३५)

आजी जरी ते असती । तरी मजला कदा न विशंभती ।
वियोग होतां आक्रंदती । ते पोटागि वेगळीच ॥ ३६॥

आज जर ती जिवंत असती तर तिने मला कधीही दूर परदेशात जाऊ दिले नसते. माझा वियोग होताच तिला अत्यंत दुःख झाले असते व ती आक्रोश करू लागली असती. आईचा कळवळा वेगळाच असतो. (३६)

पुत्र वैभवहीन भिकारी । माता तैसाचि अंगिकारी ।
दगदला देखोन अंतरीं । त्याच्या दुःखें दुःखवे ॥ ३७॥

पुत्र वैभवहीन अगदी भिकारी जरी असला, तरी माता त्याचा जसा असेल तसा स्वीकार करते. त्याला कष्ट झालेले दिसले तर त्याच्या दुःखाने ती दुःखी होते. (३७)

प्रपंच विचारें पाहातां । हें सकळ जोडे न जोडे माता ।
हें शरीर जये करितां । निर्माण जालें ॥ ३८॥

प्रपंचाबद्दल विचार करून पाहिला तर असे दिसते की बाकी सर्व गोष्टी मिळू शकतात, पण जिच्यामुळे हे शरीर निर्माण झाले, ती आई मात्र परत मिळत नाही. (३८)

लांव तरी ते माया । काय कराविया सहश्र जाया ।
परी भुलोन गेलों वायां । मकरध्वजाचेनी ॥ ३९॥

आई स्वभावाने कर्कश असली तरी आईची माया खरी असते. हजार स्त्रिया असल्या तरी ते प्रेम त्यांच्याजवळ नसते. पण कामवासनेच्या बळाने मी हे सर्व अगदी विसरून गेलो. (३९)

या येका कामाकारणें । जिवलगांसिं द्वंद घेणें ।
सखीं तींच पिसुणें । ऐसीं वाटतीं ॥ ४०॥

या एका कामवासनेच्या नादाने जिवलगांशी मी कलह केला. हितकर्ते मित्र मला शत्रूप्रमाणे वाटले. (४०)

म्हणौन धन्य धन्य ते प्रपंची जन । जे मायेबापाचें भजन ।
करिती न करिती, मन- । निष्ठुर जिवलगांसीं ॥ ४१॥

म्हणून जे लोक आईवडिलांची भक्ती करतात आणि जिवलग माणसांविषयी मन निष्ठर करीत नाहीत, ते धन्य होत. (४१)

संगती स्त्रीबाळकाची । आहे साठी जन्माची ।
परी मायेबापीं कैंचीं । मिळतील पुढें ॥ ४२॥

बायको व मुलांची सोबत आपल्याला जन्मभर लाभते, पण आईवडिलांचा सहवास फार थोडा मिळतो. त्यांची संगत पुढे कशी बरे मिळेल ? (४२)

ऐसें पूर्वीं होतें ऐकिलें । परी ते समईं नाहीं कळलें ।
मन हें बुडोन गेलें । रतिसुखाचा डोहीं ॥ ४३॥

मी पूर्वी हे सगळे ऐकले होते, पण त्यावेळी ते कळले नाही. माझे मन रतिसुखाचे डोहात अगदी बुडून गेले होते. (४३)

हे सखीं वाटती परी पिसुणें । मिळाली वैभवाकारणें ।
रितें जातां लाजिरवाणें । अत्यंत वाटे ॥ ४४॥

ज्यांना मी मित्र समजत होतो, ते लबाड होते. माझ्याजवळील पैशाच्या लोभाने ते माझ्याभोवती जमले होते. आता मोकळ्या हाताने परत जायची मला अत्यंत लाज वाटत आहे. (४४)

आता भलतैसें करावें । परि द्रव्य मेळऊन न्यावें ।
रितें जातां स्वभावें । दुःख आहे ॥ ४५

आता काय वाटेल ते करावे, परंतु द्रव्य मिळवूनच परत फिरले पाहिजे. मोकळ्या हाताने परत गेलो, तर स्वाभाविकच दुःख होणार. (४५)

ऐसी वेवर्धना करी । दुःख वाटलें अंतरीं ।
चिंतेचिये माहापुरीं । बुडोन गेला ॥ ४६॥

अशी विवंचना करीत असता त्याला मनात अत्यंत दुःख झाले. चिंतेच्या महापुरात जणू काही तो बुडून गेला. (४६)

ऐसा हा देह आपुला । असतांच पराधेन केला ।
ईश्वरीं कानकोंडा जाला । कुटुंबकाबाडी ॥ ४७॥

तो मनात म्हणू लागला की, हा देह माझा असता मी पराधीन झालो आणि ईश्वरविषयक कर्तव्याकडेदुर्लक्ष करून केवळ कुटुंबासाठी काबाडकष्ट करीत राहिलो. (४७)

या येका कामासाठीं । जन्म गेला आटाटी ।
वय वेचल्यां सेवटीं । येकलेंचि जावें ॥ ४८॥

या एका कामवासनेपायी जन्मभर आटापिटा केला. आता म्हातारपण आले आहे. आयुष्याच्या शेवटी एकट्यालाच जावे लागणार आहे. (४८)

ऐसा मनीं प्रस्तावला । क्षण येक उदास जाला ।
सवेंचि प्राणी झळंबला । मायाजाळें ॥ ४९॥

अशा प्रकारे विचार करीत असता त्याला मनात फार पश्चात्ताप झाला व एक क्षणभर तो खिन्न झाला. पण लगेचच तो मुलालेकरांच्या ममतेने मोहित होऊन मायेच्या जाळ्यात अडकला. (४९)

कन्यापुत्रीं आठवलीं । मनींहुनि क्षिती वाटली ।
म्हणे लेंकुरें अंतरलीं । माझीं मज ॥ ५०॥

मुलामुलींची आठवण होऊन मनात फार दुःख झाले आणि म्हणू लागला की, ‘माझी लेकरे मला दुरावली.’ (५०)

मागील दुःख आठवलें । जें जें होतें प्राप्त जालें ।
मग रुदन आरंभिलें । दीर्घ स्वरें ॥ ५१॥

मागे जे जे काही दुःख भोगले होते, त्याची आठवण होऊन तो दुःखी झाला आणि मोठमोठ्याने रडू लागला. (५१)

आरुण्यरुदन करितां । कोणी नाहीं बुझाविता ।
मग होये विचारिता । आअपुले मनीं ॥ ५२॥

पण अरण्यात त्याचे रडणे ऐकून त्याला समजाविणारे कुणीच नसल्याने त्याने धैर्य धरले व तो आपल्याच मनाशी विचार करू लागला. (५२)

आतां कासया रडावें । प्राप्त होतें तें भोगावें ।
ऐसे बोलोनिया जीवें । धारिष्ट केलें ॥ ५३॥

आता रडून काय उपयोग आहे ? जे प्रारब्धाने प्राप्त होते, ते भोगावेच लागते. असे म्हणून त्याने मनास धीर दिला. (५३)

ऐसा दुःखें दगदला । मग विदेशाप्रती गेला ।
पुढे प्रसंग वर्तला । तो सावध ऐका ॥ ५४॥

याप्रमाणे दुःखाने थकला भागलेला तो मग विदेशी गेला. श्री समर्थ म्हणतात की, पुढे काय प्रसंग घडला, तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावा. (५४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास चवथा ॥ ४॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (क) नाम’ समास चौथा समाप्त.

समास पाचवा : स्वगुणपरीक्षा ( ड )

॥ श्रीराम ॥

पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला व्यासंगासी ।
आपल्या जिवेसीं सोसी । नाना श्रम ॥ १॥

श्रीसमर्थ सांगतात की, याप्रमाणे पुढे विदेशात जाऊन व्यवसाय करायला सुरुवात केली व त्यासाठी तो जिवापाड नाना प्रकारचे कष्ट सोसू लागला. (१)

ऐसा दुस्तर संसार । करितां कष्टला थोर ।
पुढें दोनी च्यारी संवत्सर । द्रव्य मेळविलें ॥ २॥

याप्रमाणे प्रपंच करीत असता त्याला अत्यंत कष्ट झाले. पुढे दोन चार वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळविले. (२)

सवेंचि आला देशासी । तों आवर्षण पडिलें देसीं ।
तेणें गुणें मनुष्यांसी । बहुत कष्ट जाले ॥ ३॥

मग लगेच तो स्वदेशास परत आला. तो तेथे दुष्काळ पडला होता व त्यामुळे सर्व माणसांना अत्यंत कष्ट भोगावे लागत होते. (३)

येकांच्या बैसल्या अमृतकळा । येकांस चंद्री लागली डोळां ।
येकें कांपती चळचळा । दैन्यवाणीं ॥ ४॥

कुणाची गालफडे बसली होती तर कुणाचे डोळे निस्तेज झाले होते, कोणी अत्यंत दीन होऊन थरथरा कापत होते. (४)

येकें दीनरूप बैसलीं । येकें सुजलीं येकें मेलीं ।
ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळां ॥ ५॥

कोणी भिकल्यासारखी बसलेली, तर कुणाच्या अंगावर सूज आलेली, तर कोणी मरून गेलेली, अशी आपल्या मुलामुलींची अवस्था झालेली त्याने बघितली. (५)

तेणें बहुत दुःखी जाला । देखोनिया उभड आला ।
प्राणी आक्रंदों लागला । दैन्यवाणा ॥ ६॥

ते सर्व पाहून तो अत्यंत दुःखी झाला. त्याला गहिवरून आले व तो दीन होऊन आक्रोश करू लागला. (६)

तंव तीं अवघीं सावध जालीं । म्हणती बाबा बाबा जेऊं घाली ।
अन्नालागीं मिडकलीं । झडा घालिती ॥ ७॥

तेव्हा ती सर्व मुले सावध झाली आणि ‘बाबा, बाबा, आम्हांल जेवू घाल’ असे म्हणू लागली. अन्नासाठी आशाळभूत झालेली असल्याने त्याच्या अंगावर त्यांनी झडपच घातली. (७)

गांठोडें सोडून पाहाती । हातां पडिलें तेंचि खाती ।
कांहीं तोंडीं कांहीं हातीं । प्राण जाती निघोनी ॥ ८॥

पोरांनी बापाचे गाठोडे सोडून पाहिले व जे हाताला येईल ते ती खाऊ लागली. आणि काही अन्न तोंडात तर काही हातात असतानाच काही जणांचे प्राण निघून गेले (८)

तांतडी तांतडी जे‍ऊं घाली । तों तें जेवितां जेवितां कांहीं मेलीं ।
कांहीं होतीं धादावलीं । तेंहि मेलीं अजीर्णें ॥ ९॥

तो घाईघाईने त्यांना जेवू घालू लागला, तर जेवता जेवताच काही मेली. काही अत्यंत भुकेली होती, त्यांनी जास्त खाल्याने ती अजीर्ण होऊन मेली. (९)

ऐसीं बहुतेकें मेलीं । येक दोनीं मुलें उरलीं ।
तेंहि दैन्यवाणीं जालीं । आपलें मातेवांचुनी ॥ १०॥

अशा प्रकारे बहुतेक मुले मेली. एक-दोन उरली, पण तीही आपल्या आईवाचून अत्यंत दीनवाणी झाली. (१०)

ऐसे आवर्षण आलें । तेणें घरचि बुडालें ।
पुढें देसीं सुभिक्ष जालें । आतिशयेंसी ॥ ११॥

अशा रीतीने दुष्काळ पडल्याने त्याचे सर्व घरच बसले काही दिवसांनंतर देशात अन्नधान्याची अतिशय समृद्धी झाली. (११)

लेकुरां नाहीं वाढवितें । अन्न करावें लागे आपुलेन हातें ।
बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२॥

घरात मुलांना वाढविणारे कुणी राहिले नव्हते. स्वतःच्या हाताने अन्न शिजवावे लागे. स्वयंपाक करण्याचा त्याच्या मनाला फार त्रास वाटू लागला. (१२)

लोकीं भरीस घातलें । पुन्हां मागुतें लग्न केलें ।
द्रव्य होतें तें वेचलें । लग्नाकारणें ॥ १३॥

लोकांनी भरीला घातले म्हणून त्याने पुन्हा लग्न केले. जे द्रव्य मिळविले होते, ते लग्ननासाठी खर्च झाले. (१३)

पुन्हां विदेशासी गेला । द्रव्य मेळऊन आला ।
तव घरीं कळहो लागला । सावत्र पुत्रांसी ॥ १४॥

म्हणून तो परत विदेशी गेला व पुन्हा द्रव्य मिळवून परत आला. तो घरी बायको आणि सावत्र मुलांच्यात भांडणास सुरुवात झाली होती. (१४)

स्त्री जाली न्हातीधुती । पुत्र देखों न सकती ।
भ्रताराची गेली शक्ती । वृद्ध जाला ॥ १५॥

त्याची बायको वयात येऊन शहाणी झाली होती, ते मुलांना बघवेना. नवरा वृद्ध झाल्याने त्याच्या अंगी काहीच शक्ती उरली नव्हती. (१५)

सदा भांडण पुत्रांचें । कोणी नायकती कोणाचें ।
वनिता अति प्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६॥

मुलांमध्ये आपसांत सारखी भांडणे सुरू झाली. कोणी कोणाचे ऐकेना. त्याचे मन मात्र बायकोवर अत्यंत आसक्त झाले. (१६)

किंत बैसला मनां । येके ठाई पडेना ।
म्हणोनियां पांचा जणा । मेळविलें ॥ १७॥

एकमेकांबद्दल त्यांच्या मनांत संशय उत्पन्न झाला. काही केल्या एकमत होईना, म्हणून त्याने पंचांना बोलावून आणले. (१७)

पांच जण वांटे करिती । तों ते पुत्र नायेकती ।
निवाडा नव्हेचि अंतीं- । भांडण लागलें ॥ १८॥

पंचांनी वाटण्या करून दिल्या, पण मुलांना ते पटेना व ती ऐकेनात. काहीच निवाडा झाला नाही आणि शेवटी परत भांडणे सुरू झाली. (१८)

बापलेकां भांडण जालें । लेंकीं बापास मारिलें ।
तंव ते मातेनें घेतलें । शंखतीर्थ ॥ १९॥

बापाचे व मुलांचे भांडण जुंपले आणि मुलांनी बापाला मारले. ते पाहून आईने शंखध्वनी करायला सुरुवात केली. (१९)

ऐकोनि मेळले लोक । उभे पाहाती कौतुक ।
म्हणती बापास लेक । कामा आले ॥ २०॥

तिने बोंब मारलेली ऐकून तेथे लोक गोळा झाले आणि उभे राहून गंमत पाहू लागले. ते म्हणू लागले की ‘वा, मुले बापाच्या चांगली उपयोगी पडली !’ (२०)

ज्या कारणें केले नवस । ज्या कारणें केले सायास ।
ते पुत्र पितीयास । मारिती पहा ॥ २१॥

ज्या मुलांसाठी बापाने नवस केले, अनेक कष्ट उपसले, तीच मुले आता बापाला मारीत आहेत, पाहा ! (२१)

ऐसी आली पापकळी । आश्चिर्य मानिलें सकळीं ।
उभे तोडिती कळी । नगरलोक ॥ २२॥

असा हा पापमय कलह पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटले. मग तेथे गावातील जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटविले. (२२)

पुढें बैसोन पांच जण । वांटे केले तत्समान ।
बापलेंकांचें भांडण । तोडिलें तेहीं ॥ २३॥

पुढे पाच जणांनी बसून समसमान वाटे केले आणि त्यांनी ते बाप-लेकांचे भांडण एकदाचे मिटवले. (२३)

बापास वेगळें घातलें । कोंपट बांधोन दिधलें ।
मन कांतेचें लागलें । स्वार्थबुद्धी ॥ २४॥

त्या मुलांनी बापाला वेगळे काढले आणि एक खोपटे बांधून दिले बायकोच्या मनातही स्वार्थबुद्धी उत्पन्न झाली. (२४)

कांता तरुण पुरुष वृद्ध । दोघांस पडिला संमंध ।
खेद सांडून आनंद । मानिला तेहीं ॥ २५॥

बायको तरुण आणि नवस म्हातारा असा घरात या दोघांचाच संबंध उरला. तेव्हा खेद न करता दोघांनी त्यातच आनंद मानला. (२५)

स्त्री सांपडली सुंदर । गुणवंत आणी चतुर ।
म्हणे माझें भाग्य थोर । वृद्धपणीं ॥ २६॥

‘मला म्हातारपणी सुंदर गुणवंत आणि चतुर बायको मिळाली, हे माझे केवढे थोर भाग्य !’ असे तो म्हणू लागला. (२६)

ऐसा आनंद मानिला । दुःख सर्वही विसरला ।
तंव तो गल्बला जाला । परचक्र आलें ॥ २७॥

याप्रमाणे मागील सर्व दुःख विसरून त्याने आनंद मानला. इतक्यात चहूकडे आरडाओरडा झाला की शत्रूची धाड आली आहे. (२७)

अकस्मात धाडी आली । कांता बंदीं धरून नेली ।
वस्तभावही गेली । प्राणीयाची ॥ २८॥

अकस्मात धाड आली आणि शत्रूने त्याच्या बायकोला कैद करून धरून नेली. एवढेच नव्हे तर त्याची सर्व चीजवस्तूही गेली. (२८)

तेणें दुःख जालें भारीं । दीर्घ स्वरें रुदन करी ।
मनीं आठवे सुंदरी । गुणवंत ॥ २९॥

त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले व तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या सुंदर गुणसंपन्न बायकोची मनात त्याला आठवण येऊ लागली. (२९)

तंव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्टली ।
ऐकोनियां आंग घाली । पृथ्वीवरी ॥ ३०॥

तोपर्यंत बातमी आली की, ‘तुमच्या बायकोला भ्रष्ट केले आहे !’ हे ऐकताच तो दुःखाने धाडकन जमिनीवर कोसळला. (३०)

सव्य अपसव्य लोळे । जळें पाझरती डोळे ।
आठवितां चित्त पोळे । दुःखानळें ॥ ३१॥

डाव्या, उजव्या कुशीवर तो गडबडा लोळू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. बायकोची आठवण येऊन त्या दुःखाने त्याचे चित्त पोळू लागले. (३१)

द्रव्य होतें मेळविलें । तेंही लग्नास वेचलें ।
कांतेसिही धरून नेलें । दुराचारी ॥ ३२॥

‘ मी काही द्रव्य मिळविले होते, तेही लग्नासाठी खर्च केले आणि आता दुराचारी लोकांनी माझ्या बायकोलाही धरून नेली.’ (३२)

मजही वृद्धाप्य आलें । लेंकीं वेगळें घातलें ।
अहा देवा वोढवलें । अदृष्ट माझें ॥ ३३॥

‘मलाही आता म्हातारपण आले आहे आणि त्यात मुलांनी मला वेगळे काढले आहे. देवा, हे केवढे दुर्देव माझ्यावर ओढवले आहे ! (३३)

द्रव्य नाहीं कांता नाहीं । ठाव नाहीं शक्ति नाहीं ।
देवा मज कोणीच नाहीं । तुजवेगळें ॥ ३४॥

माझ्याजवळ आता पैसा-अडका नाही, बायकोही नाही ! घरही गेले शक्तीही उरली नाही ! देवा, आता तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीच उरलेले नाही !’ (३४)

पूर्वीं देव नाहीं पुजिला । वैभव देखोन भुलला ।
सेखीं प्राणी प्रस्तावला । वृद्धपणीं ॥ ३५॥

पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभवाला भुलला आणि शेवटी म्हातारपणी त्याला पश्चात्ताप होऊ लागला. (३५)

देह अत्यंत खंगलें । सर्वांग वाळोन गेलें ।
वातपीत उसळलें । कंठ दाटला कफें ॥ ३६॥

देह अत्यंत खंगला. सर्वांग वाळून गेले. वात, पित्त उसळले. कंठ कफाने दाटून आला. (३६)

वळे जिव्हेची बोबडी । कफें कंठ घडघडी ।
दुर्गंधी सुटली तोंडीं । नाकीं स्लेष्मा वाहे । ३७॥

जिभेची बोबडी वळली, कफाने घसा घरघरू लागला, तोंडातून दुर्गंधी सुटली, नाकातून शेंबूड वाहू लागला. (३७)

मान कांपे चळचळां । डोळे गळती भळभळां ।
वृद्धपणीं अवकळा । ठाकून आली ॥ ३८॥

मान चळचळा कापू लागली, डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले, वृद्धपणात अशी ही अवकळा प्राप्त झाली. (३८)

दंतपाटी उखळली । तेणें बोचरखिंडी पडिली ।
मुखीं लाळ गळों लागली । दुर्गंधीची ॥ ३९॥

दातांची कवळी उखडल्यामुळे बोळके झाले. तोंडातून अति दुर्गंध असलेली लाळ गळू लागली. (३९)

डोळां पाहातां दिसेना । कानीं शब्द ऐकेना ।
दीर्घ स्वरें बोलवेना । दमा दाटे ॥ ४०॥

डोळ्यांनी नीट दिसेना, कानांनी शब्द ऐकू येईना, मोठ्याने बोलताही येईना, कारण दमा वाढू लागला. (४०)

शक्ती पायांची राहिली । बैसवेना मुरुकुंडी घाली ।
बृहती वाजों लागली । तोंडाच ऐसी ॥ ४१॥

पायांतील शक्ती नाहीशी झाली. बसता येईनासे झाले. म्हणून मुरकुंडी घालून पडून राहू लागला. तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले. (४१)

क्षुधा लागतां आवरेना । अन्न समईं मिळेना ।
मिळालें तरी चावेना । दांत गेले ॥ ४२॥

भूक आवरेनाशी झाली. भुकेच्या वेळी अन्न मिळेना आणि मिळाले तरी दात पडून गेल्याने ते चावता येईना. (४२)

पित्तें जिरेना अन्न । भक्षीतांच होये वमन ।
तैशेंचि जाये निघोन । अपानद्वारें ॥ ४३॥

पित्तामुळे अन्न पचेना, खाताक्षणीच ते ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे निघून जाऊ लागले. (४३)

विष्टा मूत्र आणि बळस । भोवता वमनें केला नास ।
दुरून जातां कोंडे स्वास । विश्वजनाचा ॥ ४४॥

विष्ठा, मूत्र आणि नाकातोंडातील मळ व ओकारी यामुळे त्याच्या आजूबाजूला सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. या घाणीमुळे दुरून जाऊ लागले, तरी सुद्धा लोकांचा श्वास कोंडू लागला. (४४)

नाना दुःखें नाना व्याधी । वृद्धपणीं चळे बुद्धी ।
तर्ह्हीं पुरेना आवधी । आयुष्याची ॥ ४५॥

याप्रमाणे नाना दुःखे व नाना रोग यामुळे म्हातारपणी त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली. तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना. (४५)

पापण्या भवयाचे केंश । पिकोन झडले निःशेष ।
सर्वांगीं लोंबलें मांस । चिरकुटासारिखें ॥ ४६॥

पापण्यांचे, भुवयांचे केस पिकून पूर्णपणे गळून गेले. सर्वांगावरील मांस एखाद्या जुन्या कापडासारखे लोंबू लागले. (४६)

देह सर्व पाअरिखें जालें । सवंगडे निःशेष राहिले ।
सकळ प्राणीमात्र बोले । मरेना कां ॥ ४७॥

देह पूर्णपणे पराधीन झाला. कोणी सवंगडीही उरले नाहीत. सर्व लोक म्हणू लागले की, ‘हा एकदाचा मरत का नाही ?’ (४७)

जें जन्मून पोसलीं । तेंचि फिरोन पडिलीं ।
अंतीं विषम वेळ आली । प्राणीयासी ॥ ४८॥

ज्यांना जन्म देऊन त्यांचे पालन-पोषण केले ती मुले विरुद्ध झाली. शेवटी त्याला फार कठीण काळ आला. (४८)

गेलें तारुण्य गेलें बळ । गेलें संसारीचें सळ ।
वाताहात जालें सकळ । शरीर आणी संपत्ती ॥ ४९॥

तारुण्य गेले, अंगातली शक्ती गेली, संसाराची मस्तीही गेली. अशा प्रकारे शक्ती आणि संपत्ती जाऊन सर्व वाताहात झाली. (४९)

जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाहि वेर्थ गेला ।
कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥ ५०॥

जन्मभर स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला आणि शेवटी अंतकाळी अशी विषम परिस्थिती प्राप्त झाली. (५०)

सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी जाला ।
पुढें मागुता धोका आला । येमयातनेचा ॥ ५१॥

सुखासाठी झुरला, पण शेवटी दुःखीकष्टी झाला आणि पुढे यमयातनेचा धोका तर आहेच. (५१)

जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
म्हणोनियां तत्काळ । स्वहित करावें ॥ ५२॥

सारांश, जन्म हेच सर्व दुःखाचे मूळ असून त्याला दुःखाची इंगळी सारखी डसतच असते, म्हणून माणसाने तत्काळ स्वहित साधावे. (५२)

असो ऐसें वृद्धपण । सकळांस आहे दारुण ।
म्हणोनियां शरण । भगवंतास जावें ॥ ५३॥

श्री समर्थ म्हणतात, की असो. याप्रमाणे सर्वांना असे दारुण वृद्धपण येणारच आहे, म्हणून प्रत्येकाने भगवंतास शरण जावे. (५३)

पुढें वृद्धीस तत्वतां । गर्भीं प्रस्तावा होता ।
तोचि आला मागुता । अंतकाळीं ॥ ५४॥

गर्भावस्थेत जीवाला जसा पश्चात्ताप झाला होता, तसाच तो तत्त्वतः त्याला वृद्धपणी होतो आणि तोच पुन्हा अंतकाळीही होतो. (५४)

म्हणौनि मागुतें जन्मांतर । प्राप्त मातेचें उदर ।
संसार हा अति दुस्तर । तोचि ठाकून आला ॥ ५५॥

म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मातेच्या उदरात काही काळ राहावे लागते आणि तरून जाण्यास कठीण असा हा संसार परत त्याच्यापुढे उभा राहतो. (५५)

भगवद्भहजनावांचुनी । चुकेना हे जन्मयोनि ।
तापत्रयांची जाचणी । सांगिजेल पुढे ॥ ५६॥

या प्रकारे गर्भवास व जन्म यांतून भगवद्‌भजनावाचून सुटका होत नाही. आता पुढील समासात तीन तापांचा जाच कसा असतो ते सांगितले जाईल. (५६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास पाचवा ॥ ५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (ड) नाम’ समास पाचवा समाप्त.

समास सहावा : आध्यात्मिक ताप

॥ श्रीराम ॥

तापत्रयाचें लक्षण । आतां सांगिजेल निरूपण ।
श्रोतीं करावें श्रवण । यकाग्र हो‍ऊनी ॥ १॥

श्री समर्थ म्हणतात की, मी आता तापत्रयाच्या लक्षणांचे नीट वर्णन करतो. ते श्रोत्यांनी एकाग्र होऊन श्रवण करावे. (१)

जो तापत्रैं पोळला । तो संतसंगें निवाला ।
आर्तभूत तोषला । पदार्थ जेवी ॥ २॥

तापलेला पदार्थ जसा पाण्याने निवतो, तसा तापत्रयाने जो पोळतो, तो संतसमागमाने निवतो, शांत होतो. (२)

क्षुधाक्रांतास मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन ।
बंदीं पडिल्याचें बंधन- । तोडिनां, सुख ॥ ३॥

भुकेलेल्यास अन्न मिळावे किंवा तहानलेल्यास पाणी मिळावे किंवा बंधनात पडलेल्याची बंधनातून सुटका व्हावी, त्याप्रमाणे त्याला सुख प्राप्त होते. (३)

माहापुरें जाजावला । तो पैलतीरास नेला ।
कां तो स्वप्नींचा चे‍इला । स्वप्नदुःखी ॥ ४॥
कोणी येकासी मरण- । येतां, दिलें जीवदान ।
संकटास निवारण । तोडितां सुख ॥ ५॥

किंवा महापुरात घाबरलेल्यास पैलतीरास नेला असता तो जसा सुखी होतो किंवा स्वप्नदुःखाने दुःखी झालेल्यास जागे करावे किंवा कुणाचे मरण ओढवले असता त्याला जीवनदान द्यावे किंवा एखादा संकटात सापडला असता युक्तिप्रयुक्तीने त्याचे संकट निवारण केल्यावर त्यास जसे सुख होते. (४-५)

रोगियास औषध । सप्रचित आणी शुद्ध ।
तयासी होये आनंद । आरोग्य होतां ॥ ६॥

किंवा रोग्याला अनुभवसिद्ध असे खात्रीचे आणि उत्तम औषध मिळून आरोग्य प्राप्त झाले असता त्याला जसा आनंद होतो. (६)

तैसा संसारें दुःखवला । त्रिविधतापें पोळला ।
तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ॥ ७॥

त्याप्रमाणे संसारातील दुःखाने जो गांजलेला असतो, त्रिविध तापाने जो पोळलेला असतो, तोच एक परमार्थ मिळण्यास अधिकारी ठरतो. (७)

ते त्रिविध ताप ते कैसे । आतां बोलिजेत तैसे ।
येविषईं येक असे । वाक्याधार ॥ ८॥

ते त्रिविध ताप कसे असतात, ते आता मी सांगतो. याविषयी एक वाक्याधार आहे. (८)

श्लोक ॥ देहेंद्रियप्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते ।
इममाध्यात्मिकं तापं जायते दुःक देहिनाम् ॥ १ ॥

श्लोक १ अर्थ – देह इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख भोगावे लागते, त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. (१)

सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥ २ ॥

श्लोक २ अर्थ – सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते, तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे. तो खरोखर आधिभौतिक ताप होय. (२)

शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
स्वर्गनरकादिं भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥ ३ ॥

श्लोक ३ अर्थ – माणसाच्या चांगल्या-वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर यमयातना, स्वर्ग, नरक वगैरे जे भोग भोगावे लागतात, त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. (३)

येक ताप आध्यात्मिक । दुजा तो आदिभूतिक ।
तिसरा आदिदैविक । ताप जाणावा ॥ ९॥

एका तापास आध्यात्मिक ताप म्हणतात. दुसरा जो ताप त्यास आधिभौतिक म्हणतात आणि तिसरा ताप तो आधिदैविक जाणावा. (९)

आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण ।
आदिभूतिकांचें लक्षण । जाणिजे कैसें ॥ १०॥

आध्यात्मिक ताप म्हणजे काय, तो कसा ओळखावा, तसेच आधिभौतिक तापाचे लक्षण ते कसे जाणावे ? (१०)

आदिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा ।
हेंहि विशद कळे ऐसा । विस्तार कीजे ॥ ११॥

आधिदैविक ताप कसा असतो, त्याची अवस्था कोणती, हे सर्व स्पष्टपणे कळेल अशा प्रकारे विस्तार करून सांगा. (११)

हां जी म्हणोनि वक्ता । जाला कथा विस्तारिता ।
आध्यात्मिक ताप आतां । सावध ऐका ॥ १२॥

त्यावर वक्ता ‘हां जी’ असे म्हणून विस्तारपूर्वक सांगता झाला. तरी आता आध्यात्मिक तापासंबंधीचे निरूपण सावध होऊन ऐका. (१२)

देह इंद्रिय आणी प्राण । यांचेनि योगें आपण ।
सुखदुःखें सिणे जाण । या नांव आध्यात्मिक ॥ १३॥

देह इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने आपणास सुख-दुःख होऊन जो त्रास होतो, त्या तापाला आध्यात्मिक ताप असे नाव आहे. (१३)

देहामधून जें आलें । इंद्रियें प्राणें दुःख जालें ।
तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रईं ॥ १४॥

जे दुःख देहामधून येते आणि इंद्रिये व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते, त्याला तापत्रयात आध्यात्मिक असे म्हणतात. (१४)

देहामधून काये आलें । प्राणें कोण दुःख जालें ।
आतां हें विशद केलें । पाहिजे कीं ॥ १५॥

देहामधून कोणती दुःखे येतात आणि प्राणांमुळे ती कशी सोसावी लागतात, हे आता स्पष्ट करून सांगितले पाहिजे. (१५)

खरुज खवडे पुळिया नारु । नखरुडें मांजया देवि गोवरु ।
देहामधील विकारु । या नांव आध्यात्मिक ॥ १६॥

देहामधील विकारांना आध्यात्मिक ताप म्हणतात. ते असे- खरूज, खवडे, पुळ्या, नारु, नखुर्डे मांजऱ्या, देवी, गोवर (१६)

काखमांजरी केशतोड । वोखटें वर्ण काळफोड ।
व्याधी मूळव्याधी माहाजड । या नांव आध्यात्मिक ॥ १७॥

काखमांजरी, केस्तुड, सडके, व्रण, काळपुळी, व्याधी, दुःसह अशी मूळव्याध. (१७)

अंगुळवेडे गालफुगी । कंड लागे वाउगी ।
हिरडी सुजे भरे बलंगी । या नांव आध्यात्मिक ॥ १८॥

बोटाचे दुखणे, गालफुगी, उगीच कंड सुटणे, हिरडी सुजणे, दातांत भरणारे कस्पट (१८)

वाउगे फोड उठती । कां ते सुजे आंगकांती ।
वात आणी तिडका लागती । या नांव आध्यात्मिक ॥ १९॥

अंगावर उगीच फोड उठणे किंवा अंगाला सूज येणे, वात होणे, तिडका लागणे. (१९)

नाइटे अंदु गजकर्ण । पेहाचे पोट विस्तीर्ण ।
बैसलें टाळें फुटती कर्ण । या नांव आध्यात्मिक ॥ २०॥

नायटे, हाड्यावण, गजकर्ण, जलोदराने वाढलेले पोट कानठळ्या बसून कान फुटणे. (२०)

कुष्ट आणि वोला कुष्ट । पंड्यारोग अतिश्रेष्ठ ।
क्षयरोगाचे कष्ट । या नांव आध्यात्मिक ॥ २१॥

पांढरे कोड, महारोग, अति श्रेष्ठ असा रक्त क्षय व क्षयरोगाचे कष्ट (२१)

वाटी वटक वायेगोळा । हातीं पाईं लागती कळा ।
भोवंडी लागे वेळोवेळां । या नांव आध्यात्मिक ॥ २२॥

गाठ सरकणे, अर्भक दूध प्यायल्यावर दुधाच्या गोळ्या होऊन ते ओकते ते दुखणे किंवा वायुगोळा अथवा हातापायाला कळा लागणे, वरचेवर चक्कर येणे. (२२)

वोलांडा आणी वळ । पोटसुळाची तळमळ ।
आर्धशिसी उठे कपाळ । या नांव आध्यात्मिक ॥ २३॥

वोलांडा, वळ, पोटशूळाच्या वेदना, अर्धशिशीने कपाळ उठणे. (२३)

दुःखे माज आणि मान । पुष्ठी ग्रीवा आणि वदन ।
अस्तिसांदे दुःखती जाण । या नांव आध्यात्मिक ॥ २४॥

मान आणि कंबर दुखणे, पाठ, गळा आणि तोंड दुखणे, हाडांचे सांधे दुखणे. (२४)

कुळिक तरळ कामिणी । मुरमा सुंठरें माळिणी ।
विदेसीं लागलें पाणी । या नांव आध्यात्मिक ॥ २५॥

मोडशी, अजीर्णाची हागओक, कावीळ पुरळ गळवे, गडमाळा, विदेशांतील पाणी लागणे. (२५)

जळसोस आणी हिवारें । गिरीविरी आणी अंधारें ।
ज्वर पाचाव आणी शारें । या नांव आध्यात्मिक ॥ २६॥

कोरड पडणे, हिवताप, गरगरणे आणि अंधारी येणे. उलटलेला ज्वर, ज्वर आणि शहारे येणे. (२६)

शैत्य उष्ण आणी तृषा । क्षुधा निद्रा आणी दिशा ।
विषयतृष्णेची दुर्दशा । या नांव आध्यात्मिक ॥ २७॥

शैत्य, उष्ण, तहान, भूक, निद्रा आणि हगवण, विषयवासनेच्या अतिरेकाने होणारी दुर्दशा. (२७)

आळसी मूर्ख आणी अपेसी । भय उद्भवे मानसीं ।
विसराळु दुश्चित्त आहिर्निशी । या नांव आध्यात्मिक ॥ २८॥

आळशी, मूर्ख, अपयश, मनात भय उत्पन्न होणे. विसराळू असणे आणि रात्रंदिवस उद्विग्न असणे. (२८)

मूत्रकोड आणी परमें । रक्तपिती रक्तपरमें ।
खडाचढाचेनि श्रमे । या नांव आध्यात्मिक ॥ २९॥

लघवी अडणे, परमा, गरमी, रक्तपिती आणि रक्तपरमे, मूतखड्याचा त्रास होणे. (२९)

मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।
येक वेथा असोन न कळे । या नांव आध्यात्मिक ॥ ३०॥

मुरडा, हागवण, उन्हाळे लागणे, अवरोध झाला असता त्रासणे किंवा रोग असून तो कोणता हे न कळणे. (३०)

गांठी ढळली जाले जंत । पडे आंव आणी रक्त ।
अन्न तैसेचि पडत । या नांव आध्यात्मिक ॥ ३१॥

गाठ सरकणे, जंत होणे, आव आणि रक्त पडणे किंवा अन्न न पचता तसेच पडणे. (३१)

पोटफुगी आणी तडस । भरला हिर लागला घांस ।
फोडी लागतां कासावीस । या नांव आध्यात्मिक ॥ ३२॥

पोटफुगी, तडस लागणे, ठसका लागणे, घास लागणे, मुखातील लहान फोडामुळे जीव कासावीस होणे. (३२)

उचकी लागली उसित गेला । पीत उसळलें उलाट झाला ।
खरे पडसा आणी खोंकला । या नांव आध्यात्मिक ॥ ३३॥

उचकी लागणे, घास अडकणे, पित्त उसळून उलटी होणे, जीभकाटे, पडसे, खोकला होणे. (३३)

उसळला दमा आणी धाप । पडजिभ ढासि आणी कफ ।
मोवाज्वर आणी संताप । या नांव आध्यात्मिक ॥ ३४॥

दमा उसळून धाप लागणे, पडजिभेमुळे ढास लागणे, कफ होणे, मोवाज्वर आणि संताप येणे. (३४)

कोणी सेंदूर घातलाअ । तेणें प्राणी निर्बुजला ।
घशामध्ये फोड जाला । या नांव आध्यात्मिक ॥ ३५॥

कोणी शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे. घशामध्ये फोड येणे. (३५)

गळसोट्या आणी जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे ।
दंतहीन लागती किडे । या नांव आध्यात्मिक ॥ ३६॥

घटसर्प आणि जीभ झडणे, तोंडाला सदा दुर्गंधी येणे, दात पडून हिरड्यांना कीड लागणे. (३६)

जरंडी घोलाणा गंडमाळा । अवचिता स्वयें फुटे डोळा ।
आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ॥ ३७॥

पाथरी वाढणे, घोळणा फुटणे, गंडमाळा, अकस्मात डोळा फुटणे, आपलेच बोट आपण कापून घेणे. (३७)

कळा तिडकी लागती । कां ते दंत उन्मळती ।
अधर जिव्हा रगडती । या नांव आध्यात्मिक ॥ ३८॥

कळा व तिडका लागणे, दात उपटले जाणे, दातांनी ओठ किंवा जीभ चावली जाणे. (३८)

कर्णदुःख नेत्र दुःख । नाना दुःखें घडे शोक ।
गर्भांध आणी नपुश्यक । या नांव आध्यात्मिक ॥ ३९॥

कान ठणकणे, डोळे दुखणे, नाना प्रकारच्या दुःखामुळे शोक होणे, गर्भांध किंवा नपुंसक असणे. (३९)

फुलें वडस आणी पडळें । कीड गर्ता रातांधळें ।
दुश्चित्त भ्रमिष्ट आणी खुळें । या नांव आध्यात्मिक ॥ ४०॥

डोळ्यात फूल पडणे, वडस वाढणे, मोतीबिंदू काचबिंदू होणे, पापण्यांना कीड पडणे, डोळे असून न दिसणे, रातांधळेपणा, दुद्धि श्चत्तपणा, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा. (४०)

मुकें बधीर राखोंडें । थोटें चळलें आणी वेडें ।
पांगुळ कुर्हें आणी पावडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४१॥

मुकेपणा, बधिरपणा, ओठ तुटणे, हात तुटणे, वृत्ती चळणे, वेडेपणा, पांगळेपणा, आखूड पाय असणे, कुबड असणे. (४१)

तारसें घुलें काणें कैरें । गारोळें जामुन टाफरें ।
शडांगुळें गेंगाणें विदरें । या नांव आध्यात्मिक ॥ ४२॥

तारवटलेले डोळे असणे, वाकडी मान असणे, तिरळेपणा, घारे डोळे असणे, अति ठेंगणेपणा, सारखे ठेचकाळणे, हाताला सहा बोटे असणे, गेंगणेपणा, कुरूपता. (४२)

दांतिरें बोचिरें घानाळ । घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ ।
अति कृश अति स्थूळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४३॥

दांतरेपणा, बोचरेपणा लांब नाक असणे, नाकच नसणे, कान नसणे, बडबड करणे, अतिकृशता, अतिस्थूलता. (४३)

तोंतरें बोंबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटीळ ।
मत्सरी खादाड तपीळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४४॥

तोतरेपणा, बोबडेपणा, अशक्तपणा, रोगटपणा, कुरूपता, कुटिलता, मत्सरी स्वभाव, खादाडपणा, तापटपणा. (४४)

संतापी अनुतापी मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी ।
पापी अवगुणी विकारी । या नांव आध्यात्मिक ॥ ४५॥

संतापणे, पश्चात्ताप करणे, मत्सर करणे, कामना असणे, हेवा अथवा तिरस्कार करणे, पाप करणे, अवगुण असणे, विकारवशता. (४५)

उठवणें ताठा करक । आवटळे आणी लचक ।
सुजी आणी चालक । या नांव आध्यात्मिक ॥ ४६॥

उठता न येणे, अंग ताठणे, अवघडणे, लचकणे, सूज येणे आणि संधिवात. (४६)

सल आडवें गर्भपात । स्तनगुंते सनपात ।
संसारकोंडे आपमृत्य । या नांव आध्यात्मिक ॥ ४७॥

न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात होणे, स्तनात गाठी होणे, सन्निपात, संसारातील अडचणी, अपमृत्यू (४७)

नखविख आणी हिंगुर्डें । बाष्ट आणी वावडें ।
उगीच दांतखीळ पडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४८॥

नखविष आणि नखुर्डे शिळे व वातुळ खाण्याने होणारे रोग, वावडे खाण्याने होणारा त्रास, उगीच दातखीळ बसणे. (४८)

झडती पातीं सुजती भवया । नेत्रीं होती राझणवडीया ।
चाळसी लागे प्राणियां । या नांव आध्यात्मिक ॥ ४९॥

डोळ्यांच्या पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्याला रांजणवाड्या होणे, डोळ्यांना चष्मा लागणे. (४९)

वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडे मसें ।
चुकुर हो‍इजे मानसें । या नांव आध्यात्मिक ॥ ५०॥

काक्सरपुळ्या, तीळ पांढरेचट्टे काळेचट्टे चामखीळ गालगुंड केसाळ काळे चट्टे मनाने भ्रमिष्ट होणे. (५०)

नाना फुग आणी आवाळें । आंगीं दुर्गंधी प्रबळे ।
चाईचाटी लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ॥ ५१॥

अंगावर येणारे फुगवटे, आवाळे, अंगाला अत्यंत दुर्गंधी येणे, डोक्यावरील केस गळून चट्टे पडणे, तोंडातून लाळ गळणे. (५१)

नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी ।
व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ॥ ५२॥

नाना प्रकारच्या चिंतेने काळवंडणे, नाना दुःखांनी चित्त पोळून निघणे, काही आजार नसून जीवाची तगमग होणे. (५२)

वृद्धपणीच्या आपदा । नाना रोग होती सदा ।
देह क्षीण सर्वदा । या नांव आध्यात्मिक ॥ ५३॥

वृद्धपणाच्या यातना, सदा काही ना काही रोग होणे, देह नेहमी क्षीण असणे. (५३)

नाना व्याधी नाना दुःखें । नाना भोग नाना खांडकें ।
प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ॥ ५४॥

नाना रोग व नाना प्रकारचे दुःख, नाना भोग, अनेक जखमा, यांमुळे माणसाला दुःख होऊन तळमळणे. (५४)

ऐसा आध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप ।
सांगतां सरेना अमूप । दुःखसागर ॥ ५५॥

अशा प्रकारचे आध्यात्मिक ताप हे पूर्वजन्मातील पातकांचे फळ असते. त्यांचे कितीही वर्णन केले तरी पुरे पडत नाही, असा हा न संपणारा दुःखाचा समुद्र आहे. (५५)

बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें ।
पुढें बोलिजे स्वभावें । आदिभूतिक ॥ ५६॥

श्रीसमर्थ म्हणतात की, आणखी किती वर्णन करावे ? श्रोत्यांनी वरील उदाहरणांवरून समजून घ्यावे. आता पुढील समासात स्वाभाविकच आधिभौतिक तापाचे निरूपण केले जाईल. (५६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आध्यात्मिकतापनिरूपणनाम समास सहावा ॥ ६॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘आध्यात्मिकतापनाम’ समास सहावा समाप्त.

समास सातवा : आधिभौतिक ताप

॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । आध्यात्मिकाचें लक्षण ।
आतां आदिभूतिक तो कोण । सांगिजेल ॥ १॥

श्री समर्थ म्हणतात की, मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण वर्णन केले. आता आधिभौतिक ताप कोणता ते सांगितले जाईल. (१)

श्लोक ॥ सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥

अर्थ- सर्व भूतमात्रांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते त्या दुसर्‍या दुःखाला यथार्थ रीतीने आधिभौतिक असे म्हणतात. (१)

सर्व भूतांचेनि संयोगें । सुखदुःख उपजों लागे ।
ताप होतां मन भंगे । या नांव आदिभूतिक ॥ २॥

सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते, त्याने ताप होऊन मन दुःखी होते, त्याला आधिभौतिक असे म्हणतात. (२)

तरी या आदिभूतिकाचें लक्षण । प्रांजळ करूं निरूपण ।
जेणें अनुभवास ये पूर्ण । वोळखी तापत्रयाची ॥ ३॥

तरी आता या आधिभौतिक तापाची लक्षणे स्पष्टपणे वर्णन करू या, म्हणजे त्यायोगे तापत्रयाची चांगली ओळख होऊन अनुभवही येईल. (आधिभौतिक दुःखे पुढीलप्रमाणे) (३)

ठेंचा लागती मोडती कांटे । विझती शस्त्रांचे धायटे ।
सला सिलका आणी सरांटे । या नांव आदिभूतिक ॥ ४॥

ठेच लागणे, पायात काटे मोडणे, शस्त्रांचे घाव लागून जखमा होणे, लाकडाचे बारीक काट्यासारखे कुसळ चुया आणि सराटे इत्यादी घुसणे. (४)

अंग्या आणी काचकुहिरी । आवचटा लागे शरीरीं ।
गांधील ये‍ऊन दंश करी । या नांव आदिभूतिक ॥ ५॥

आग्या वनस्पती शरीरास अकस्मात लागून आग होणे किंवा खाजकुहिरी लागून अंगास खाज सुटणे, गांधीलमाशी येऊन चावणे. (५)

मासी गोमासी मोहळमासी । मुंगी तेलमुंगी डांस दसी ।
सोट जळू लागे यासी । आदिभूतिक बोलिजे ॥ ६॥

माशी, गोमाशी, मोहोळमाशी, मुंगी, तेलमुंगी, डास यांनी दंश करणे किंवा सोट म्हणजे रक्त पिणारा किडा किंवा जळू अंगास चिकटणे. (६)

पिसा पिसोळे चांचण । कुसळें मुंगळे ढेंकुण ।
विसीफ भोवर गोंचिड जाण । या नांव आदिभूतिक ॥ ७॥

पिसवा, पिसोळे, चांचड, कुसळे, मुंगळे, ढेकूण, इसब उत्पन्न करणारे किडे, भुंगे, गोचीड यांचा दंश. (७)

गोंबी विंचु आणी विखार । व्याघ्र लाअंडिगे आणी शूकर ।
गौसायळ सामर । या नांव आदिभूतिक ॥ ८॥

गोम, विंचू आणि साप, वाघ, लांडगे आणि डुक्कर, साळू, सांबर यांचे दंश. (८)

रानगाई रानम्हैसे । रानशकट्ट आणी रीसें ।
रानहाती लांवपिसें । या नांव आदिभूतिक ॥ ९॥

वनगाई, रानम्हशी, रानबैल अस्वले रानहत्ती इत्यादी जनावरांचा मार आणि डाकिणीमुळे लागणारे वेड (९)

सुसरीनें वोढून नेलें । कां तें आवचितें बुडालें ।
आथवा खळाळीं पडिलें । या नांव आदिभूतिक ॥ १०॥

सुसरीने ओढून नेणे किंवा अवचित बुडून मरणे अथवा पाय घसरून प्रवाहात पडणे. (१०)

नाना विखारें आजगर । नाना मगरें जळचर ।
नाना वनचरें अपार । या नांव आदिभूतिक ॥ ११॥

नाना विषारी साप, अथवा अजगर, मगरी वगैरे नाना जलचर प्राणी यांनी ओढून नेणे. अनेक जंगली प्राण्यांपासून दुःख होणे. (११)

अश्व वृषभ आणी खर । स्वान शूकर जंबुक मार्जर ।
ऐसीं बहुविध क्रूर । या नांव आदिभूतिक ॥ १२॥

घोडा, बैल गाढव, कुत्री, डुक्कर कोल्हे, मांजर अशा अनेक कूर पशूमुळे दुःख होणे. (१२)

ऐसीं कर्कशें भयानकें । बहुविध दुःखदायकें ।
दुःखें दारुणें अनेकें । या नांव आदिभूतिक ॥ १३॥

अशी कर्कश, भयानक, नाना प्रकारे दुःख देणारी अनेक दारुण दुःखे. (१३)

भिंती माळवंदे पडती । कडे भुयेरीं कोंसळती ।
वृक्ष आंगावरी मोडती । या नांव आदिभूतिक ॥ १४॥

भिंती आणि गच्च्या कोसळणे, कडे, भुयारे कोसळून अंगावर पडणे किंवा झाडे मोडून अंगावर पडणे. (१४)

कोणी येकाचा श्राप जडे । कोणी येकें केले चेडे ।
आधांतरी होती वेडे । या नांव आदिभूतिक ॥ १५॥

कुणा एकाचा शाप बाधणे, कोणी तरी जादूटोणा करणे, कारण नसताना वेड लागणे. (१५)

कोणी येकें चाळविलें । कोणी येकें भ्रष्टविले ।
कोणी येकें धरून नेलें । या नांव आदिभूतिक ॥ १६॥

कुणीतरी फसविणे, कोणी तरी भ्रष्टविणे, कोणीतरी धरून नेणे. (१६)

कोणी येकें दिलें वीष । कोणी येकें लाविले दोष ।
कोणी येकें घातलें पाश । या नांव आदिभूतिक ॥ १७॥

कुणी तरी विष देणे, कुणी तरी दोषारोप करणे, कुणीतरी फास घालणे. (१७)

अवचिता सेर लागला । नेणो बिबवा चिडला ।
प्राणी धुरें जाजावला । या नांव आदिभूतिक ॥ १८॥

कल्पना नसताना शेराच्या झाडाचा चीक अंगाला लागणे, बिब्बा उतणे किंवा धुराने जीव घाबरा होणे. (१८)

इंगळावरी पाय पडे । शिळेखालें हात सांपडे ।
धावतां आडखुळे पडे । या नांव आदिभूतिक ॥ १९॥

मोठ्या विंचवावर, इंगळीवर पाय पडणे दगडखाली हात सापडणे, धावताना अडखळून पडणे. (१९)

वापी कूप सरोवर । गर्ता कडा नदीतीर ।
आवचितें पडे शरीर । या नांव आदिभूतिक ॥ २०॥

विहिरी, कूप, सरोवर मोठा खड्डा, कडा किंवा नदीतीर या ठिकाणी एकाएकी शरीर पडणे. (२०)

दुर्गाखालें कोंसळती । झाडावरून पडती ।
तेणें दुह्खें आक्रंदती । या नांव आदिभूतिक ॥ २१॥

किल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे आणि त्या दुःखाने आक्रोश करणे. (२१)

सीतें वोठ तरकती । हात पाव टांका फुटती ।
चिखल्या जिव्हाळ्या लागती । या नांव आदिभूतिक ॥ २२॥

थंडीने ओठ फुटणे, हात, पाय, टाचा यांना भेगा पडणे, चिखल्या होणे, जिव्हाळी लागणे. (२२)

अशनपानाचिये वेळे । उष्ण रसें जिव्हा पोळे ।
दांत कस्करे आणी हरळे । या नांव आदिभूतिक ॥ २३॥

खातापिताना उष्ण पदार्थाने जीभ पोळणे, दात करकरणे आणि दातात फटी पडणे. (२३)

पराधेन बाळपणीं । कुशब्दमारजाचणी ।
अन्नवस्त्रेंवीण आळणी । या नांव आदिभूतिक ॥ २४॥

बालपणी पसधीनतेमुळे शिव्यांचा, वाईट शब्दांचा मार सोसावा लागणे, अन्नवस्त्रांची कमतरता असणे. (२४)

सासुरवास गालोरे । ठुणके लासणें चिमोरे ।
आलें रुदन न धरे । या नांव आदिभूतिक ॥ २५॥

मुलींना सासुरवासापायी गालगुच्चे, ठोसे, चिमटे डागणे, इत्यादी जाच सोसताना रडू न आवरणे. (२५)

चुकतां कान पिळिती । कां तो डोळा हिंग घालिती ।
सर्वकाळ धारकीं धरिती । या नांव आदिभूतिक ॥ २६॥

चूक झाली असता कान पिळला जाणे, डोळ्यांत हिंग घालणे, सतत धारेवर धरणे. (२६)

नाना प्रकारीचे मार । दुर्जन मारिती अपार ।
दुरी अंतरे माहेर । या नांव आदिभूतिक ॥ २७॥

दुष्टांनी नाना तर्‍हेने मारहाण करणे, मुलींना माहेर दुरावणे. (२७)

कर्णनासिक विंधिलें । बळेंचि धरून गोंधिलें ।
खोडी जालिया पोळविलें । या नांव आदिभूतिक ॥ २८॥

कानाला, नाकाला भोके पडणे, बळेच धरून गोंदणे, जरा चूक झाली असता आगीचे चटके देणे. (२८)

परचक्रीं धरून नेलें । नीच यातीस दिधलें ।
दुर्दशा हो‍ऊन मेलें । या नांव आदिभूतिक ॥ २९॥

शत्रूचा हल्ला आला असता त्यांनी धरून नेणे, नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे आणि त्यामुळे दुर्दशा होऊन मरण पावणे. (२९)

नाना रोग उद्भवले । जे आध्यात्मिकीं बोलिले ।
वैद्य पंचाक्षरी आणिले । या नांव आदिभूतिक ॥ ३०॥

पूर्वी जे आध्यात्मिक रोग वर्णन केले आहेत, त्यातील अनेक रोग होणे. त्यांच्या उपचारांकरिता वैद्य अथवा मांत्रिक आणणे. (३०)

नाना वेथेचें निर्शन । व्हावया औषध दारुण ।
बळात्कारें देती जाण । या नांव आदिभूतिक ॥ ३१॥

अनेक रोगांचे निरसन करण्यासाठी बळजबरीने दारुण औषधे देणे. (३१)

नाना वल्लीचे रस । काडे गर्गोड कर्कश ।
घेतां होये कासावीस । या नांव आदिभूतिक ॥ ३२॥

नाना वनस्पतींचे रस, काढे, व कडवट चाटणे वगैरे घेताना जीव कासावीस होणे. हे सर्व आधिभौतिक तापच आहेत. (३२)

ढाळ आणी उखाळ देती । पथ्य कठीण सांगती ।
अनुपान चुकतां विपत्ती । या नांव आदिभूतिक ॥ ३३॥

जुलाब आणि वातीचे औषध घ्यावे लागणे, कडक पथ्य करावे लागणे, अनुपानात चूक झाल्याने कष्ट होणे. (३३)

फाड रक्त फांसणी । गुल्लडागांची जाचणी ।
तेणें दुःखें दुःखवे प्राणी । या नांव आदिभूतिक ॥ ३४॥

शरीराची चिरफाड करणे, गाठीवर शस्त्राने चिरा पाडणे व त्यामुळे रक्तस्त्राव होणे, तप्त सळईचे डाग घेणे व त्यायोगे दुःखाने व्याकूळ होणे. (३४)

रुचिक बिबवे घालिती । नाना दुःखें दडपे देती ।
सिरा तोडिती जळा लाविती । या नांव आदिभूतिक ॥ ३५॥

रुईचा चीक अथवा बिय्या घालणे, नाना दुःखाचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे. (३५)

बहु रोग बहु औषधें । सांगतां अपारें अगाधें ।
प्राणी दुखवे तेणें खेदें । या नांव आदिभूतिक ॥ ३६॥

नाना रोग व त्यावर नाना प्रकारची औषधे आणि उपचार आहेत. ते वर्णन करावयाचे ठरवले तर अपार अगाध असल्याने पुरे पडणार नाही. या दुःखांनी अत्यंत दुःख होणे. (३६)

बोलाविला पंचाक्षरी । धूरमार पीडा करी ।
नाना यातना चतुरीं । आदिभूतिक जाणिजे ॥ ३७॥

पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक बोलाविला असता त्याने धुराचा मारा करणे अशा नाना प्रकारच्या यातना आहेत त्या शहाण्यांनी आधिभौतिक म्हणून जाणाव्या. (३७)

दरवडे घालूनियां जना । तश्कर करिती यातना ।
तेणें दुःख होये मना । या नांव आदिभूतिक ॥ ३८॥

चोर दरोडे घालून लोकांना छळतात, त्यामुळे मनाला फार दुःख होणे. (३८)

अग्नीचेनि ज्वाळें पोळे । तेणें दुःखें प्राणी हरंबळे ।
हानी जालियां विवळे । या नांव आदिभूतिक ॥ ३९॥

अग्नीच्या ज्याळांनी होरपळल्यामुळे व्याकूळ होणे, अन्य नुकसान झाले तरी विव्हळणे. (३९)

नाना मंदिरें सुंदरें । नाना रत्नांचीं भांडारें ।
दिव्यांबरें मनोहरें । दग्ध होती ॥ ४०॥

नाना सुंदर मंदिरे अनेक रजांचे साठे, अनेक मनोहर दिव्य वस्त्रे इत्यादी जळणे. (४०)

नाना धान्यें नाना पदार्थ । नाना पशु नाना स्वार्थ ।
नाना पात्रें नाना अर्थ । मनुष्यें भस्म होती ॥ ४१॥

नाना धान्ये, नाना पदार्थ, नाना पशू घरात साठविलेले द्रव्य, भांडी- कुंडी, नाना वस्तू आणि माणसे जळून जाणे. (४१)

आग्न लागला सेती । धान्यें बणव्या आणी खडकुती ।
युक्षदंड जळोन जाती । अकस्मात ॥ ४२॥

शेते, धान्ये, गवताच्या गंजी आणि मळणीनंतर उरलेले कुठार, ऊस वगैरे अकस्मात जळून जाणे. (४२)

ऐसा आग्न लागला । अथवा कोणी लाविला ।
हानी जाली कां पोळला । या नांव आदिभूतिक ॥ ४३॥

अशी आग कोणी लावली किंवा आपोआप लागली तरी त्यामुळे नुकसान होणे किंवा भाजणे. (४३)

ऐसें सांगतां बहुत । होती वन्हीचे आघात ।
तेणे दुःखें दुःखवे चित्त । या नांव आदिभूतिक ॥ ४४॥

अशा अनेक प्रकाशने आगीपासून नुकसान होतच असते, त्या दुःखाने जीव व्याकूळ होणे. (४४)

हारपे विसरे आणी सांडे । नासे गाहाळ फुटे पडे ।
असाध्य होये कोणीकडे । या नांव आदिभूतिक ॥ ४५॥

वस्तू हरवणे, विसरणे किंवा सांडून जाणे, नासून जाणे, गहाळ होणे किंवा पडून फुटणे, परत मिळणे अशक्य होणे. (४५)

प्राणी स्थानभ्रष्ट जालें । नाना पशूतें चुकलें ।
कन्यापुत्र गाहाळले । या नांव आदिभूतिक ॥ ४६॥

माणूस स्थानभ्रष्ट होणे, जनावरे चुकणे, मुली, मुले बेपत्ता होणे. (४६)

तश्कर अथवा दावेदार । आवचितां करिती संव्हार ।
लुटिती घरें नेती खिल्लार । या नांव आदिभूतिक ॥ ४७॥

चोर किंवा शत्रू यांनी अवचित धाड घालून संहार करणे, घरे लुटणे, दुभती जनावरे पळवून नेणे. (४७)

नाना धान्यें केळी कापिती । पानमळां मीठ घालिती ।
ऐसे नाना आघात करिती । या नांव आदिभूतिक ॥ ४८॥

शेतातील उभी पिके, केळी वगैरे कापून नेणे, पानमळ्याचे नुकसान व्हावे म्हणून त्यात मीठ घालणे असे नाना प्रकारचे आघात. (४८)

मैंद उचले खाणोरी । सुवर्णपंथी भुररेकरी ।
ठकु सिंतरु वरपेकरी । वरपा घालिती ॥ ४९॥
गठीछोडे द्रव्य सोडिती । नाना आळंकार काढिती ।
नाना वस्तु मूषक नेती । या नांव आदिभूतिक ॥ ५०॥

पेंढारी, उचलेगिरी करणारे भुरटे चोर, काळीज खाणारे किमयागार, भुलविणारे ठग, लुच्चे, लबाड लोक, लुटारू दरोडेखोर इत्यादींची पीडा. वाटमाऱ्यांनी गाठोडी सोडून द्रव्य व नाना अलंकार पळविणे, उंदरांनी अनेक वस्तू नेणे. (४९-५०)

वीज पडे हिंव पडे । प्राणी प्रजंनी सांपडे ।
कां तो माहापुरीं बुडे । या नांव आदिभूतिक ॥ ५१॥

अंगावर वीज पडणे, अत्यंत थंडी पडणे, मुसळधार पावसात सापडणे, महापुरात वाहून जाणे, बुडणे. (५१)

भोवरें वळणें आणी धार । वोसाणें लाटा अपार ।
वृश्चिक गोंबी आजगर । वाहोन जाती ॥ ५२॥

भोवऱ्यात, वळणात किंवा धारेत सापडणे, पुरात वाहून येणारी लाकडे, अपार लाटा आणि महापुराबरोबर वाहून येणारे अजगर विंचू गोमा इत्यादी प्राण्यांचा त्रास. (५२)

तयामधें प्राणी सांपडला । खडकी बेटीं आडकला ।
बुडत बुडत वांचला । या नांव आदिभूतिक ॥ ५३॥

या सर्वांमध्ये माणूस सापडणे किंवा एखाद्या खडकावर अथवा बेटावर अडकणे, बुडता बुडता वाचणे. (५३)

मनासारिखा नसे संसार । कुरूप कर्कश स्त्री क्रूर ।
विधवा कन्या मूर्ख पुत्र । या नांव आदिभूतिक ॥ ५४॥

कुरूप, कर्कश आणि निर्दय बायको मिळणे, कन्या विधवा होणे आणि पुत्र मूर्ख निपजणे, यांसारख्या कारणांनी प्रपंच मनासारखा न होणे. (५४)

भूत पिशाच्च लागलें । आंगावरून वारें गेलें ।
अबद्धमंत्रे प्राणी चळलें । या नांव आदिभूतिक ॥ ५५॥

भूतपिशाच्च लगणे अंगावरून वारे जाणे चुकलेल्या मंत्रामुळे मनुष्य भ्रमिष्ट होणे. (५५)

ब्राह्मणसमंध शरीरीं । बहुसाल पीडा करी ।
शनेश्वराचा धोका धरी । या नांव आदिभूतिक ॥ ५६॥

ब्राह्मणसंमंधाने देह झपाटून अनेक वर्षे छळणे. शनीची वाईट दशा, साडेसाती वगैरे येणे. (५६)

नाना ग्रहे काळवार । काळतिथी घातचंद्र ।
काळवेळ घातनक्षत्र । या नांव आदिभूतिक ॥ ५७॥

इतर ग्रहांची वाईट दशा येणे. काळ्यार काळतिथी, चंद्राचे घातक योग, काळवेळ आणि घातनक्षत्र यांपासून त्रास. (५७)

सिंक पिंगळा आणी पाली । वोखटें होला काक कलाली ।
चिंता काजळी लागली । या नांव आदिभूतिक ॥ ५८॥

शिंकेचा अपशकुन होणे, पाल चुकचुकणे, पिंगळा होला, कावळा, कलाली इत्यादींनी अपशकुन केल्याने चिंता, काळजी लागणे. (५८)

दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला ।
दुःस्वप्नें जाजावला । या नांव आदिभूतिक ॥ ५९॥

कुडमुड्या जोशी, भविष्य सांगणारा ज्योतिषी यांनी सांगितल्यामुळे काळजी लागणे, वाईट स्वप्ने पडून त्यामुळे भय वाटणे. (५९)

भालु भुंके स्वान रडे । पाली अंगावरी पडे ।
नाना चिन्हें चिंता पवाडे । या नांव आदिभूतिक ॥ ६०॥

कोल्हेकुई, कुत्र्याचे रडणे, पाल अंगावर पडणे, इत्यादी अनेक अपशकुनांच्या योगे मनात चिंता उत्पन होणे. (६०)

बाहेरी निघतां अपशकून । नाना प्रकारें विछिन्न ।
तेणें गुणें भंगे मन । या नांव आदिभूतिक ॥ ६१॥

घराबाहेर पडताना नाना प्रकारे अपशकुन होऊन त्यामुळे मन खिन्न, उदास होणे. (६१)

प्राणी बंदी सांपडला । यातने वरपडा जाला ।
नाना दुःखें दुःखवला । या नांव आदिभूतिक ॥ ६२॥

कैदेत सापडून तेथे अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागणे आणि त्यायोगे नाना प्रकारचे दुःख सोसावे लागणे. (६२)

प्राणी राजदंड पावत । जेरबंद चाबुक वेत ।
दरेमार तळवेमार होत । या नांव आदिभूतिक ॥ ६३॥

राजाकडून दंड किंवा शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक, वेताची छडी यांनी मारणे, दरीत लोटून मारणे किंवा तापलेल्या तव्यावर उभे करून मारणे. (६३)

कोरडे पारंब्या फोक । बहुप्रकारें अनेक ।
बहुताडिती आदिभूतिक । या नांव बोलिजे ॥ ६४॥

चामड्याचा चाबूक, झाडाच्या पारंब्या आणि फोक म्हणजे झाडाची सालपटे अशी मारण्याची अनेक साधने वापरून दिलेला खूप मार सोसणे. (६४)

मोघरीमार बुधलेमार । चौखुरून डंगारणेमार ।
बुक्या गचांड्या गुढघेमार । या नांव आदिभूतिक ॥ ६५॥

गुदद्वारी मेख मारणे, दारूच्या बुधल्यास बांधून आग लावून देणे. चारी बाजूंनी ताणून धरून बडग्यांनी मारणे, बुक्क्या मारणे, गचांड्या मारणे गुडघ्यावर मारणे. (६५)

लाता तपराखा सेणमार । कानखडे दगडमार ।
नाना प्रकारींचे मार । या नांव आदिभूतिक ॥ ६६॥

लाथा मारणे, चपराका मारणे, शेणमारा करणे, कानात खडे खुपसणे, दगडांनी मारणे, अशा नाना प्रकारांनी मारणे. (६६)

टांगणें टिपया पिछोडे । बेडी बुधनाल कोलदंडे ।
रक्षणनिग्रह चहूंकडे । या नांव आदिभूतिक ॥ ६७॥

टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात खेचून मागे बांधणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्याशी नालाकृती बांधून मारणे, कोलदांडे घालणे, इकडे तिकडे जराही हलू न देणे. (६७)

नाकवणी चुनवणी । मीठवणी रायवणी ।
गुळवण्याची जाचणी । या नांव आदिभूतिक ॥ ६८॥

नाकात तीक्ष्ण पदार्थ ओतणे किंवा चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकात, कानात वा घशात ओतल्याने यातना होणे. (६८)

जळामध्यें बुचकळिती । हस्तीपुढें बांधोन टाकिती ।
हाकिती छळिती यातायाती । या नांव आदिभूतिक ॥ ६९॥

पाण्यात बुचकळणे, हात पाय बांधून हत्तीपुढे टाकणे, गुरांप्रमाणे हाकणे, छळणे, उगाच कष्ट देणे. (६९)

कर्णछेद घ्राणछेद । हस्तछेद पादछेद ।
जिव्हाछेद अधरछेद । या नांव आदिभूतिक ॥ ७०॥

कान कापणे, नाक कापणे, हात, पाय तोडणे, जीभ कापणे, ओठ कापणे. (७०)

तीरमार सुळीं देती । नेत्र वृषण काढिती ।
नखोनखीं सुया मारिती । या नांव आदिभूतिक ॥ ७१

बाणांनी मारणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, नखांत सुया मारणे. (७१)

पारड्यामध्यें घालणें । कां कडेलोट करणें ।
कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक ॥ ७२॥

पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे किंवा तोफेच्या तोंडी उडविणे. (७२)

कानीं खुंटा आदळिती । अपानीं मेखा मारिती ।
खाल काढून टाकिती । या नांव आदिभूतिक ॥ ७३॥

कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारी मेख मारणे, नखशिखांत अंगाचे कातडे सोलणे. (७३)

भोत आणी बोटबोटी । अथवा गळ घालणें कंठीं ।
सांडस लावून आटाटी । या नांव आदिभूतिक ॥ ७४॥

पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून मारणे, अथवा गळ्याला गळ टोचणे, तापलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे. (७४)

सिसें पाजणें वीष देणें । अथवा सिरछेद करणें ।
कां पायातळीं घालणें । या नांव आदिभूतिक ॥ ७५॥

उकळत्या शिशाचा रस पाजणे, विष देणे, शिरच्छेद करणे किंवा अंगावर माणसे नाचवून पायदळी तुडवून मारणे हे सर्व शिक्षेचे प्रकार (७५)

सरड मांजरें भरिती । अथवा फांसीं ने‍ऊन देती ।
नानापरी पीडा करिती । या नांव आदिभूतिक ॥ ७६॥

अंगावरील कपड्यात सरडे इत्यादी भरणे, बंद खोलीत पिसाळलेले मांजर अंगावर सोडणे, अथवा फाशी देणे, अशा नाना प्रकारांनी पीडा करणे. (७६)

स्वानप्रळये व्याघ्रप्रळये । भूतप्रळये सुसरीप्रळये ।
शस्त्रप्रळये विझप्रळये । या नांव आदिभूतिक ॥ ७७॥

कुत्री, वाघ, भुतेखेते, सुसरी, नाना शस्त्रे, अंगावर वीज पडणे वगैरेंचा अतिरेक होणे व त्यामुळे मरण ओढवणे. (७७)

सीरा वोढून घेती । टेंभें ला‍उन भाजिती ।
ऐशा नाना विपत्ती । या नांव आदिभूतिक ॥ ७८॥

अंगातील शिरा तोडणे, टेंभे लावून त्यांनी अंगाला चटके देणे. अशा नाना विपत्ती. (७८)

मनुष्यहानी वित्तहानी । वैभवहानी महत्वहानी ।
पशुहानी पदार्थहानी । या नांव आदिभूतिक ॥ ७९॥

जवळची माणसे मरणे, वित्तहानी, वैभव नाहीसे होणे, मानसन्मान यांची हानी, जनावरे मरणे, इतर चीजवस्तू नाहीशी होणे. (७९)

बाळपणीं मरे माता । तारुण्यपणीं मरे कांता ।
वृद्धपणीं मृत्य सुता । या नांव आदिभूतिक ॥ ८०॥

बालपणात आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे. (८०)

दुःख दारिद्र आणी रुण । विदेशपळणी नागवण ।
आपदा अनुपत्ति कदान्न । या नांव आदिभूतिक ॥ ८१॥

दुःख, दारिद्रय, कर्ज, परदेशी पळून जावे लागणे, लूट होऊन सर्वस्वास मुकणे, संकटे येणे, आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासणे, कदन्न खायची वेळ येणे. (८१)

आकांत वाखाप्रळये । युद्ध्य होतां पराजये ।
जिवलगांचा होये क्षये । या नांव आदिभूतिक ॥ ८२॥

महामारीने हजारो माणसे मरणे व त्यामुळे हाहाकार माजणे, युद्धात पराजय होणे, जिवलग माणसे मृत्यू पावणे. (८२)

कठीण काळ आणी दुष्काळ । साशंक आणी वोखटी वेळ ।
उद्वेग चिंतेचे हळाळ । या नांव आदिभूतिक ॥ ८३॥

आधीच कठीण काळ असता त्यात दुष्काळ पडणे, मनात धास्तावलेला असता वाईट वेळ येणे, उद्वेग आणि चिंता यांमुळे हालहाल होणे. (८३)

घाणा चरखीं सिरकला । चाकाखालें सांपडला ।
नाना वन्हींत पडिला । या नांव आदिभूतिक ॥ ८४॥

घाण्यात किंवा चरकात सापडून चाकाखाली येणे, नाना प्रकारच्या आगीत सापडणे. (८४)

नाना शस्त्रें भेदिला । नाना स्वापदीं भक्षिला ।
नाना बंदीं पडिला । या नांव आदिभूतिक ॥ ८५॥

नाना शस्त्रांनी जखमा होणे. नाना श्वापदांनी खाणे, अनेक लोकांच्या कैदेत पडणे. (८५)

नाना कुवासें निर्बुजे । नाना अपमानें लाजे ।
नाना शोकें प्राणी झिजे । या नांव आदिभूतिक ॥ ८६॥

नाना प्रकारच्या वाईट स्थळी राहावे लागल्याने श्वास कोंडणे, नाना प्रकारे अपमान झाल्याने लाज वाटणे, नाना प्रकारच्या शोकांनी खंगून जाणे, या सर्वांस आधिभौतिक तापच म्हणतात. (८६)

ऐसें सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर ।
श्रोतीं जाणावा विचार । आदिभूतिकाचा ॥ ८७॥

याप्रकारे आधिभौतिक ताप म्हणजे दुःखाचे डोंगरच असून ते अपार आहेत. येथे जे सांगितले आहेत, त्यावरून श्रोत्यांनी आधिभौतिक तापाच्या स्वरूपासंबंधी विचार जाणून घ्यावा, असे समर्थ म्हणतात. (८७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आदिभौतिकतापनिरूपणनाम समास सातवा ॥ ७॥

इति श्रीदासबोधे गुरूशिव्यसंवादे ‘आदिभौतिकतापनाम’ समास सातवा समाप्त.

समास आठवा : आधिदैविक ताप

॥ श्रीराम ॥

मागां बोलिला आध्यात्मिक । त्याउपरीं आदिभूतिक ।
आतां बोलिजेल आदिदैविक । तो सावध ऐका ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, प्रथम आध्यात्मिक तापाचे निरूपण केले. त्यानंतर आधिभौतिक तापाचे वर्णन केले. आता आधिदैविक तापासंबंधी जे सांगतो, ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. (१)

श्लोक: शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥

श्लोक अर्थ- आपल्या चांगल्या-वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग नरकादींचे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक म्हणतात. (१)

शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं येमयातना ।
स्वर्ग नर्क भोग नाना । या नांव आधिदैविक ॥ २॥

लोकांना त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्माच्या योगे मरणानंतर यमयातना अथवा स्वर्ग किंवा नरकादी नाना भोग भोगावे लागतात, त्यांना आधिदैविक असे म्हणतात. (२)

नाना दोष नाना पातकें । मदांधपणें अविवेकें ।
केलीं, परी तें दुःखदायकें । येमयातना भोगविती ॥ ३॥

माणूस जिवंत असता मदांधपणाने किंवा अविचाराने नाना दोष, नाना पातके करतो, त्या वेळी त्याला काही वाटत नाही. पण त्यामुळेच त्याला दुःखदायक अशा यमयातना भोगाव्या लागतात. (३)

आंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें ।
नाना सामर्थ्याचेनि बळें । अकृत्य करिती ॥ ४॥

शारीरिक बळाने, द्रव्यबळाने, मनुष्यबळाने, राजबळाने किंवा इतर नाना शक्तींच्या बळाने मनुष्य जे करू नये, तेच कुकर्म करतो. (४)

नीती सांडूनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां ।
येमयातना भोगितां । जीव जाये ॥ ५॥

याप्रमाणे नीती सोडून वास्तविक जे करू नये, ते कृत्य केल्याने नंतर जेव्हा यमयातना भोगाव्या लागतात, तेव्हा जीव कासावीस होतो. (५)

डोळे झांकून स्वार्थबुद्धीं । नाना अभिळाश कुबुद्धीं ।
वृत्ति भूमिसिमा सांधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६॥

मनुष्य अति स्वार्थबुद्धीने अंध बनून, कुबुद्धी व अतिलोभ यांमुळे अनेक दुष्कृत्ये करतो. आपल्या निर्वाहाचे साधन असलेली जी जमीन त्याला मिळालेली असते तिची हद्द वाढविणे, दुसऱ्याचे द्रव्य, बायको व इतर चीजवस्तू पळविणे. (६)

मातलेपणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात ।
अप्रमाण क्रिया करीत । म्हणौन येमयातना ॥ ७॥

अत्यंत माज चढल्याप्रमाणे उन्मत्तपणे वागणे, जीवघात, कुटुंबघात करणे इत्यादी अनुचित कृत्ये केल्याने त्याला यमयातना भोगाव्या लागतात. (७)

मर्यादा सांडूनि चालती । ग्रामा दंडी ग्रामाधिपती ।
देशा दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ ८॥

नीतिन्यायाची चाड न धरता मर्यादा सोडून वागले असता ग्रामाधिपती गावाला दंड करतो. देशाधिपती देशाला दंड करतो. (८)

देशाधिपतीस दंडिता रावो । रायास दंडिता देवो ।
राजा न करितां नीतिन्यावो । म्हणौन यमयातना ॥ ९॥

देशाधिपती जरनीतिन्याय-मर्यादा सोडून वागू लागला, तर त्याला राजा दंड करतो. राजा अयोग्य वागला तर त्याला देव दंड करतो. गजाने जर नीतिन्याय सोडला तर त्यालाही यमयातना भोगाव्या लागतात. (९)

अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी हो‍ऊन राहे ।
राज्याअंतीं नर्क आहे । म्हणौनियां ॥ १०॥

स्वार्थाने, अनीतीने वागल्यास राजालाही पाप लागते व यज्याअती नरकात जावे लागते. (१०)

राजा सांडितां राजनीति । तयास येम गांजिती ।
येम नीति सांडितां धावती । देवगण ॥ ११॥

राजाने राजनीति सोडली तर त्यास यम शासन करतो आणि यमाने नीती सोडली तर देवगण धावून येतो व त्याला शासन करतो. (११)

ऐसी मर्यादा लाविली देवें । म्हणौनि नीतीनें वर्तावें ।
नीति न्याय सांडितां भोगावें । येमयातनेसी ॥ १२॥

भगवंताने अशी मर्यादा घालून दिलेली आहे, म्हणून सदैव नीतीने वागावे. नीतिन्याय सोडून वर्तन केल्यास यमयातना भोगाव्या लागतात. (१२)

देवें प्रेरिले येम । म्हणौनि आदिदैविक नाम ।
तृतीय ताप दुर्गम । येमयातनेचा ॥ १३॥

देव यमास प्रेरणा देऊन त्याच्याद्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो, म्हणून त्यांना आधिदैविक म्हणतात. हा यमयातनेचा तृतीय ताप अत्यंत दुर्गम आहे. (१३)

येमदंड येमयातना । शास्त्रीं बोलिले प्रकार नाना ।
तो भोग कदापि चुकेना । या नांव आदिदैविक ॥ १४॥

शास्त्रांमध्ये यमदंड आणि यमयातना यांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. तो भोग कधीही चुकवता येत नाही. त्याला आधिदैविक म्हणतात. (१४)

येमयातनेचे खेद । शास्त्रीं बोलिले विशद ।
शेरीरीं घालून, अप्रमाद- । नाना प्रकारें ॥ १५॥

माणूस जी नाना प्रकारची पापे करतो, त्याचे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठवले जातात. त्या दोषास अनुसरून त्याचा स्थूल देह पडल्यावर त्याला नाना प्रकारच्या यमयातना सोसाव्या लागतात. त्यांचे अनेक प्रकार असून त्यांचे शास्त्रांत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. (१५)

पापपुण्याचीं शरीरे । स्वर्गीं असती कळिवरें ।
त्यांत घालून नाना प्रकारें । पापपुण्य भोगविती ॥ १६॥

मरणोत्तर लोकात ह्या स्थूल देहापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी पाप-पुण्याची शरीरे असतात. त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार ती शरीरे धारण करतो व त्या प्रमाणे नाना प्रकारचे भोग भोगतो. (१६)

नाना पुण्यें विळास । नाना दोषें यातना कर्कश ।
शास्त्रीं बोलिलें अविश्वास- । मानूंच नये ॥ १७॥

त्याने पुष्कळ पुण्य केले असेल तर त्याला स्वर्गात नाना प्रकारचे विलासाचे सुख प्राप्त होते व नाना दोष, पातके केली असतील, तर कठोर यातना सोसाव्या लागतात, असे शास्त्र सांगते. त्या शास्त्रावर अविश्वास कधीही नसावा. (१७)

वेदाज्ञेनें न चालती । हरिभक्ती न करिती ।
त्यास येमयातना करिती । या नांव आदिदैविक ॥ १८॥

जे वेदाज्ञेचे पालन करीत नाहीत, हरिभक्तीही करीत नाहीत, त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. (१८)

अक्षोभ नर्कीं उदंड जीव । जुनाट किडे करिती रवरव ।
बांधोन टाकिती हातपाव । या नांव आदिदैविक ॥ १९॥

अक्षोभ नावाचा नरक आहे, त्यात असंख्य जुने किडे वळवळ करीत असतात, पापी जीवास हातपाय बांधून त्या नरकात टाकून देतात. (१९)

उदंड पैस लाहान मुख । कुंभाकार कुंड येक ।
दुर्गंधी उकाडा कुंभपाक । । या नांव आदिदैविक ॥ २०॥

काही पापी जीवांना कुंभपाक नावाच्या नरकात टाकतात. कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे आत उदंड जागा असलेले कुंभाच्या आकाराचे एक कुंड असते, त्यात अत्यंत दुर्गंधी व उकाडा असतो. (२०)

तप्तभूमिका ताविती । जळत स्थंभ पोटाळविती ।
नाना सांडस लाविती । या नांव आदिदैविक ॥ २१॥

काही पापी जीवांना तापलेल्या भूमीवर भाजतात, काहींच्या पोटावरून जळत असलेला खांब फिरवितात किंवा शरीरास अनेक प्रकारचे चाप लावतात. (२१)

येमदंडाचे उदंड मार । यातनेची सामग्री अपार ।
भोग भोगिती पाअपी नर । या नांव आदिदैविक ॥ २२॥

यमदंडाच्या मागचे अनेक प्रकार आहेत. यातनेची साधने अपार आहेत. पापी लोकांना त्याच्या यातना भोगाव्या लागतात. (२२)

पृथ्वीमध्यें मार नाना । त्याहून कठीण येमयातना ।
मरितां उसंतचि असेना । या नांव आदिदैविक ॥ २३॥

पृथ्वीवर माराचे नाना प्रकार असले तरी यमयातना त्याहून फारच कठीण असतात. तेथील यातना थांबतच नाहीत. (२३)

चौघे चौंकडे वोढिती । येक ते झोंकून पाडिती ।
ताणिती मारिती वोढूनि नेती । या नांव आदिदैविक ॥ २४॥

चारजण चहूंकडे ओढतात, कुणी झोके देऊन पाडतात, तर कुणी ताणून धरतात. कुणी मारतात तर कुणी ओढून फरफटत नेतात. (२४)

उठवेना बसवेना । रडवेना पडवेना ।
यातनेवरी यातना । या नांव आदिदैविक ॥ २५॥

त्या प्राण्याची उठवेना, बसवेना, रडता येईना, पडता येईना, यातनेवर यातना चालूच आहेत, अशी स्थिती होते. (२५)

आक्रंदे रडे आणि फुंजे । धकाधकीनें निर्बुजे ।
झुर्झरों पंजर हो‍ऊन झिजे । या नांव आदिदैविक ॥ २६॥

जीव तेथे आक्रोश करतो, रडतो, गहिवरतो, फुसफुसतो, तेथील धक्काबुक्कीने कासावीस होतो, सारखी झुरणी लागल्याने झिजून केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो. (२६)

कर्कश वचनें कर्कश मार । यातनेचे नाना प्रकार ।
त्रास पावती दोषी नर । या नांव आदिदैविक ॥ २७॥

कर्कश बोलणे ऐकून घ्यावे लागते, असह्य मार, अनेक प्रकारच्या यातना, यांमुळे दोषी लोकांना फार त्रास भोगावा लागतो. (२७)

मागां बोलिलां राजदंड । त्याहून येमदंड उदंड ।
तेथील यातना प्रचंड । भीमरूप दारुण ॥ २८॥

पूर्वी राजदंडाचे वर्णन केले आहे, पण त्याहूनही हा यमदंड फार भयंकर असतो. तेथील यातना फार मोठ्या अत्यंत दारुण व प्रचंड असतात. (२८)

आध्यात्मिक आदिभूतिक । त्याहूनि विशेष आदिदैविक ।
अल्प संकेतें कांहींयेक । कळावया बोलिलें ॥२९॥

श्रीसमर्थ म्हणतात की, प्रथम आध्यात्मिक आधिभौतिक तापाचे वर्णन केले. पण त्याहूनही आधिदैविक ताप फारच वेगळा व असह्य असतो. त्याची थोडी तरी कल्पना यावी म्हणून काही थोडीशी लक्षणे येथे सांगितली आहेत. (२९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिदैविकतापनिरूपणनाम
समास आठवा ॥ ८॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आदिदैविकतापनाम’ समास आठवा समाप्त.

समास नववा : मृत्युनिरूपण

॥ श्रीराम ॥

संसार म्हणिजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार ।
मापीं लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, संसार म्हणजे स्वतःच स्वार होणे, म्हणजे जीव स्वतः सच्चिदानंदस्वरूप असून त्याचे विस्मरण झाल्याने तो स्वतःला देह मानून बळेच या जन्म-मरणाच्या चक्रात सापडतो. एकदा यात जन्म घेतला की, मरण चुकत नाही. मरणाची घटना उधार नाही. आजची उद्यावर कुणीच ढकलू शकत नाही. माणसाच्या शरीराला क्षणाक्षणाचे माप लागलेले आहे. क्षणाक्षणाने तो मृत्यूच्या निकट जात असतो. (१)

नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती ।
कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ॥ २॥

जन्माला आल्यापासून काळ नेहमी बरोबरच असतो. पुढे काय होणार आहे, हे कुणीच सांगू शकत नाही, कुणालाच ते कळत नाही. ज्याचे जसे कर्म असेल, त्याप्रमाणे माणूस देशात अथवा परदेशात मृत्यू पावतो. (२)

सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ॥ ३॥

पूर्वसंचित पूर्णपणे संपताच एक क्षणभराचाही अवकाश मिळत नाही. अखेरची वेळ आली की निमिष भरते न भरते तोच देह सोडून जावेच लागते. (३)

अवचितें काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें ।
ने‍ऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥ ४॥

अचानक काळाचे दूत येऊन एकदम जीवाला मारत सुटतात आणि पुढे घालून मृत्युपंथाने घेऊन जातात. (४)

होतां मृत्याची आटाटी । कोणी घालूं न सकती पाठीं ।
सर्वत्रांस कुटाकुटी । मागेंपुढें होतसे ॥ ५॥

एकदा मृत्यूची धाड पडली की, कोणी पाठीशी घालू शकत नाही. सर्वांनाच काळ कुटून टाकतो. त्यात कुणाला लवकर मरण येते तर कुणाला उशिरा. (५)

मृत्युकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं ।
माहाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥ ६॥

मृत्युकाळ म्हणजे जणू भरभक्कम काठीच आहे. कितीही बलवान माणूस असला तरी त्याच्या मस्तकावरही तिचा प्रहार होतोच. अत्यंत बलाढ्य राजेरजवाडेही तिच्यापुढे टिकू शकत नाहीत. (६)

मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा जुंझार ।
मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरांगणीं ॥ ७॥

मृत्यू असे म्हणत नाही की, हा क्रूर आहे, हा झुंजार आहे किंवा हा समरांगणी संग्रामशूर आहे, (७)

मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी ।
मृत्य न म्हणे उग्ररूपी । माहांखळ ॥ ८॥

किंवा हा कोपी आहे, हा प्रतापी आहे, हा महादुष्ट असून अत्यंत उग्र स्वरूपाचा आहे, (८)

मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य ।
मृत्य न म्हणे आढ्य । सर्व गुणें ॥ ९॥

किंवा हा बलाढ्य आहे, हा धनाढ्य आहे किंवा हा सर्वगुणसंपन्न आहे, (९)

मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे हा श्रीमंत ।
मृत्य न म्हणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १०॥

हा प्रसिद्ध आहे, हा श्रीमंत आहे व हा अद्‌भुत पराक्रमी आहे, (१०)

मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥

किंवा हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा तंत्रमंत्र प्रयोग जाणणारा करामती आहे, (११)

मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥

हा अश्वांचा धनी आहे, हा गजपती आहे किंवा हा अत्यंत विख्यात राजा आहे. (१२)

मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥ १३॥

किंवा हा लोकांत श्रेष्ठ आहे किंवा हा राजकारणी आहे किंवा हा वेतन घेणारा किंवा अनेकांना वेतन देणारा मालक आहे. (१३)

मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई ।
मृत्य न म्हणे ठाई ठाई । पुंड राजे ॥ १४॥

हा देसाई आहे किंवा हा व्यवसायी आहे किंवा ठिकठिकाणचे पुंड राजे आहेत, (१४)

मृत्य न म्हणे मुद्राधारी । मृत्य न म्हणे व्यापारी ।
मृत्य न म्हणे परनारी । राजकन्या ॥ १५॥

हा राजमुद्रा धारण करणारा आहे, हा व्यापारी आहे, ही परदारा आहे किंवा ही राजकन्या आहे, (१५)

मृत्य न म्हणे कार्याकारण । मृत्य न म्हणे वर्णावर्ण ।
मृत्य न म्हणे हा ब्राह्मण । कर्मनिष्ठ ॥ १६॥

हे कार्य आहे, हे कारण आहे, हा उच्चवर्णीय आहे किंवा हा नीचवर्णाचा आहे किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, (१६)

मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न ।
मृत्य न म्हणे विद्वज्जन । समुदाई ॥ १७॥

हा व्युत्पन्न आहे, हा संपन्न आहे किंवा सभेतील हे मोठे विद्वान पंडित आहेत, (१७)

मृत्य न म्हणे हा धूर्त । मृत्य न म्हणे बहुश्रुत ।
मृत्य न म्हणे हा पंडित । माहाभला ॥ १८॥

हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, हा मोठा सज्जन असून पंडित आहे, (१८)

मृत्य न म्हणे पुराणिक । मृत्य न म्हणे हा वैदिक ।
मृत्य न म्हणे हा याज्ञिक । अथवा जोसी ॥ १९॥

हा पुराणिक आहे, हा वैदिक आहे, हा याज्ञिक आहे आणि हा जोशी किंवा ज्योतिषी आहे. (१९)

मृत्य न म्हणे अग्निहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री ।
मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ॥ २०॥

हा अग्निहोत्री आहे, हा श्रौतशास्त्रवेत्ता याज्ञिक आहे किंवा हा पूर्णपणे तंत्रमंत्रशास्त्र जाणणारा आहे, (२०)

मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ ।
मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥ २१॥

हा शास्त्रज्ञ आहे, हा वेदज्ञ आहे, हा सर्वज्ञ असून सर्व जाणतो, (२१)

मृत्य न म्हणे ब्रह्मत्या । मृत्य न म्हणे गोहत्या ।
मृत्य न म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ॥ २२॥

हा ब्रह्महत्या करणारा आहे, हा गोहत्या करणारा आहे किंवा स्त्री, बाल इत्यादींची हत्या करणात आहे. (२२)

मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी ।
मृत्य न म्हणे तत्वज्ञानी । तत्ववेत्ता ॥ २३॥

हा रागज्ञानी आहे, हा तालज्ञानी आहे किंवा हा तत्त्व जाणारा तत्त्वज्ञानी आहे, (२३)

मृत्य न म्हणे योग्याभ्यासी । मृत्य न म्हणे संन्यासी ।
मृत्य न म्हणे काळासी । वंचूं जाणे ॥ २४॥

हा योगाभ्यासी आहे, हा संन्यासी आहे. हा काळाला फसवू शकेल असा योगी आहे, (२४)

मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध ।
मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५॥

हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य आहे किंवा हा पंचाक्षरी आहे, (२५)

मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी ।
मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन । २६॥

हा गोसावी आहे, हा तपस्वी आहे किंवा हा मनोजयी असून विरक्त आहे, (२६)

मृत्य न म्हणे ऋषेश्वर । मृत्य न म्हणे कवेश्वर ।
मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥ २७॥

हा ऋषीश्वर आहे, हा कवीश्वर आहे, हा दिगंबर आहे, हा समाधिस्थ आहे, (२७)

मृत्य न म्हणे हठयोगी । मृत्य न म्हणे राजयोगी ।
मृत्य न म्हणे वीतरागी । निरंतर ॥ २८॥

हा हठयोगी आहे, हा राजयोगी आहे किंवा हा निरंतर विरक्त आहे, (२८)

मृत्य न म्हणे ब्रह्मच्यारी । मृत्य न म्हणे जटाधारी ।
मृत्य न म्हणे निराहारी । योगेश्वर ॥ २९॥

हा ब्रह्मचारी आहे, हा जलधारी आहे, हा निराहारी योगेश्वर आहे, (२९)

मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत ।
मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३०॥

हा संत आहे, हा महंत आहे, हा हवे तेव्हा गुप्त होणारा आहे, (३०)

मृत्य न म्हणे हा स्वाधेन । मृत्य न म्हणे हा पराधेन ।
सकळ जीवांस प्राशन । मृत्युचि करी ॥ ३१॥

हा स्वाधीन आहे, हा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यूच खाऊन टाकतो. (३१)

येक मृत्युमार्गी लागले । येकीं आर्धपंथ क्रमिले ।
येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२॥

काही जीव जन्मतःच मरतात, काही अर्धे आयुष्य जगून मरतात तर काही वृद्धपणी मरतात. (३२)

मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण ।
मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ॥ ३३॥

मृत्यू हा विचारच करीत नाही की, हा बाल आहे, हा तरुण आहे, हा सुलक्षण आहे किंवा हा खूप बोलका आहे की, हा चतुर शहाणा आहे. (३३)

मृत्य न म्हणे हा आधारु । मृत्य न म्हणे उदार ।
मृत्य न म्हणे हा सुंदर । चतुरांग जाणे ॥ ३४॥

हा अनेकांचा आधार आहे किंवा हा उदार आहे, हा सुंदर असून चतुरस्त्र आहे, (३४)

मृत्य न म्हणे पुण्यपुरुष । मृत्य न म्हणे हरिदास ।
मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ॥ ३५॥

हा पुण्यपुरुष आहे, हा हरिदास आहे किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे. (३५)

आतां असो हें बोलणें । मृत्यापासून सुटिजे कोणें ।
मागेंपुढें विश्वास जाणें । मृत्युपंथें ॥ ३६॥

आता हे बोलणे पुरे झाले. मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही. प्रत्येक जीवास लवकर अगर उशिरा पण निश्चितपणे मृत्युपंथानेच जावे लागते. (३६)

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौयासी लक्ष जीवयोनी ।
जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७॥

सृष्टीत असणाऱ्या जरायुज, अंडज, स्वेदज व उद्‌भिज्ज या चार प्रकारच्या प्राण्यांना परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार प्रकारच्या वाणींना, चौऱ्यांशी लक्ष जीवयोनींना म्हणजेच जे जे जन्मास येतात त्या सर्व प्राण्यांना मृत्यू चुकत नाही. (३७)

मृत्याभेणें पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा ।
मृत्यास न ये चुकवितां । कांहीं केल्या ॥ ३८॥

मृत्यूला भिऊन पळून जावे म्हटले तरी मृत्यू सर्वथा सोडतच नाही. काहीही केले तरी मृत्यूला चुकविता येतच नाही. (३८)

मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी ।
मृत्य न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९॥

हा माणूस स्वदेशातील आहे की विदेशातील आहे किंवा हा निरंतर उपवास करणारा आहे, याचा विचार मृत्यू करीत नाही. (३९)

मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर ।
मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४०॥

माणूस अत्यंत थोर असला, प्रत्यक्ष हरिहर असले किंवा भगवंताचे अवतार जरी असले तरी मृत्यू त्यांना जुमानीत नाही. (४०)

श्रोतीं कोप न करावा । हा मृत्यलोक सकळांस ठावा ।
उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्यपंथें ॥ ४१॥

हे सर्व ऐकून श्रोत्यांनी राग मागू नये. हा मृत्युलोक आहे हे सर्वजण जाणतातच. जो जन्माला येतो, तो प्राणी मृत्यूच्या मार्गाने जातो हे ठरलेलेच आहे. (४१)

येथें न मनावा किंत । हा मृत्यलोक विख्यात ।
प्रगट जाणती समस्त । लहान थोर ॥ ४२॥

या बाबतीत संशय घेणे योग्य नव्हे. कारण लहान- थोर सर्वांनाच हे स्पष्ट माहीत आहे. (४२)

तथापी किंत मानिजेल । तरी हा मृत्यलोक नव्हेल ।
याकारणें नासेल । उपजला प्राणी ॥ ४३॥

जरी संशय घेतला, तरी हा मृत्युलोक नाही, असे होणार आहे का ? म्हणून येथे जन्मलेला प्रत्येकजण मरणारच. (४३)

ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें ।
जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥ ४४॥

तरी हे जाणून घेऊन प्रत्येक जीवाने आपल्या आयुष्याचे सार्थकच करावे. मृत्यूने देह नष्ट झाला तरी या लोकात त्याने कीर्तिरूपाने उरावे. (४४)

येरवीं प्राणी लहान थोर । मृत्य पावती हा निर्धार ।
बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंची नये ॥ ४५॥

नाहीतर जे लहान- थोर प्राणी या जगात येतात, ते सर्व मृत्यू पावतात हे अगदी निश्चितच आहे. म्हणून आत्तापर्यंत जे काही सांगितले, ते खोटे मानूच नये. (४५)

गेले वहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे ।
गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथें ॥ ४६॥

अत्यंत वैभवसंपन्न, दीर्घायुषी, ज्यांचा महिमा अगाध होता, असे सर्व शेवटी मृत्युपंथानेच गेले. (४६)

गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी ।
गेले बहुत संग्रामी । संग्रामसौरे ॥ ४७॥

अत्यंत पराक्रमी, अत्यंत कपटी, संग्रामशूर असे अनेक रणांगणांवर संग्राम करीत असतानाच गेले. (४७)

गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळांचे ।
गेले बहुतां कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८॥

अत्यंत बलवान असलेले अत्यंत दीर्घायुषी, अनेक कुलेत अनेक कुळातील प्रसिद्ध राजे सगळे गेले. (४८)

गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक ।
गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९॥

अनेक लोकांचे पालनपोषण करणारे अनेकांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे मोठ्या युक्तीने तर्क करणारे तर्कवादी सगळे गेले (४९)

गेले विद्येचे सागर । गेले बळाचे डोंघर ।
गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथे ॥ ५०॥

विद्येचे सागर असणारे बळाचे डोंगर असणारे, धनाचे कुबेर असणारे सगळे मृत्युपंथानेच गेले. (५०)

गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे ।
गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ॥ ५१॥

मोठ्या पुरुषार्थाचे, अत्यंत पराक्रम गाजवलेले, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते सर्व गेले. (५१)

गेले बहुत शस्त्रधारी । गेले बहुत परोपकारी ।
गेले बहुत नाअनापरी । धर्मरक्षक ॥ ५२॥

अनेक शस्त्रधारी, अनेक परोपकारी, नाना प्रकारे धर्माचे रक्षण करणारे सगळे गेले. (५२)

गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तीचे ।
गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३॥

मोठे प्रतापवान, मोठे कीर्तिमान व अत्यंत नीतीने वागणारे नीतिवंत अनेक राजेही गेले. (५३)

गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी ।
गेले बहुत वेवादी । बहुतांपरीचे ॥ ५४॥

मोठे मतवादी किंवा अनेक मतवादी, अनेक कार्यवादी, अनेक प्रकारचे वादविवाद करणारे सर्व गेले (५४)

गेलीं पंडितांची थाटें । गेलीं शब्दांचीं कचाटें ।
गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५॥

पंडितांचे समुदाय गेले शब्दाची खटपट लटपट करणारे गेले, नाना मतांचे प्रतिपादन करून अचाट वाद करणारे गेले. (५५)

गेले तापषांचे भार । गेले संन्यासी अपार ।
गेले विचारकर्ते सार । मृत्यपंथे ॥ ५६॥

तपस्वी लोकांचे समुदाय गेले, असंख्य संन्यासी गेले सारासार विचार करणारे विचारवंतही मृत्युपंथानेच गेले (५६)

गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी ।
गेले बहुत नानापरी । नाना छंद करूनी ॥ ५७॥

अनेक संसारी गेले, अनेक वेषधारी गेले. नाना प्रकारचे व्यं करणारे अनेकलोक आपला छंद करता करता गेले (५७)

गेले ब्राह्मणसमुदाये । गेले बहुत आच्यार्य ।
गेले बहुत सांगों काये । किती म्हणौनि ॥ ५८॥

ब्राह्मणांचे समुदाय गेले, अनेक आचार्य गेले, असे अनेकानेक लोक गेले. किती म्हणून सांगावे ? (५८)

असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले ।
जे स्वरुपाकार जाले । आत्मज्ञानी ॥ ५९॥

असो. याप्रमाणे सर्व मृत्युपंथानेच गेले, फक्त जे स्वरूपाकार झाले ते आत्मज्ञानीच फक्त एकटे रहिले. (५९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मृत्यनिरूपणनाम समास नववा ॥ ९॥

इति श्रीदासबोधे गुरुशिव्यसंवादे ‘मृत्युनिरूपणनाम’ समास नववा समाप्त.

समास दहावा : वैराग्य निरूपण

॥ श्रीराम ॥

संसार म्हणिजे माहापूर । माजीं जळचरें अपार ।
डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, संसार म्हणजे महापूर आहे. त्यात असंख्य जलचर प्राणी आहेत. संसाराच्या महापुरात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करण्यासाठी धावत येत असतात. (१)

आशा ममता देहीं बेडी । सुसरी करिताती तडातोडी ।
ने‍ऊन दुःखाचे सांकडी- । माजीं घालिती ॥ २॥

आशा आणि ममता या बेड्या सूक्ष्म देहाला बांधून ठेवतात. जलामधील सुसरी शरीराचे लचके तोडून दुःखाच्या कपारीत घालतात. (२)

अहंकारनक्रें उडविलें । ने‍ऊनि पाताळीं बुडविलें ।
तेथुनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥ ३॥

अहंकाररूपी मगर जीवाला पाताळात उंच नेऊन बुडवितो. तेथून सुटणे जीवाला शक्य होत नाही. (३)

काम =मगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वोहटेना । भूलि पडिली ॥ ४॥

कामवासनेची मगरमिठी सुटत नाही. तिरस्कार मनात उत्पन होतो, तो सुटत नाही. मदमत्सर हे विकारही कमी होत नाहीत. अशा प्रकारे माणूस एक प्रकारे मोहित होतो. (४)

वासनाधामिणी पडिली गळां । घालून वेंटाळें वमी गरळा ।
जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥ ५॥

वासनारूपी धामीण गळ्यात पडते. ती गळ्याभोवती वेटोळे घालून विष ओकत असते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळत राहते. म्हणजे वासनेच्या विळख्यात जीव जखडला जातो (५)

माथां प्रपंचाचें वोझें । घे‍ऊन म्हणे माझें माझें ।
बुडतांही न सोडी, फुंजे । कुळाभिमानें ॥ ६॥

डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन जीव सतत ‘माझे माझे’ म्हणत राहतो. बुडायची पाळी आली तरी कुळाभिमानाने फुगतो आणि ते ओझे काही उतरवायला तयार होत नाही. (६)

पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें ।
आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥ ७॥

भ्रांतीचा अंधार पडतो. त्यात अभिमानरूपी चोर सर्वस्व हरण करतो म्हणजे अज्ञानामुळे विपरीत ज्ञान अर्थात देहबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे अहंकार उत्पन्न होतो. तो भूतबाधेप्रमाणे माणसाला झपाटून टाकतो. (७)

बहुतेक आवर्तीं पडिले । प्राणी वाहातचि गेले ।
जेंहिं भगवंतासी बोभाईलें । भावार्थबळें ॥ ८॥

बहुतेक जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडून वाहातच जातात. पण काही माणसे भावार्थाच्या बळावर भगवंताचा धावा करतात. (८)

देव आपण घालूनि उडी । तयांसी नेलें पैलथडी ।
येर तें अभाविकें बापुडीं । वाहातचि गेलीं ॥ ९॥

अशा लोकांना देव स्वतः धाव घेऊन उडी घालून वाचवतो व पैलतीसवर नेतो. बाकी जे श्रद्धाहीन लोक असतात, ते बिचारे त्या महापुरात वाहातच जातात. (९)

भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोन भुलला ।
संकटीं पावे भाविकाला । रक्षितसे ॥ १०॥

भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे. भाविक भक्तांचा भावार्थ पाहून तो भुलतो व संकटात धाव घेऊन भक्तांचे रक्षण करतो. (१०)

जयास भगवंत आवडे । तयाचें देवासीं सांकडें ।
संसारदुःख सकळ उडे । निजदासाचें ॥ ११॥

ज्याला भगवंत मनापासून आवडतो, त्याच्या संकटाचे ओझे भगवंतावर पडते व त्यामुळे भगवंत आपल्या अंतरंग भक्ताचे संसारदुःख सगळे नाहीसे करतो. (११)

जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे ।
धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२॥

जे ईश्वराला सर्वस्वी शरण जातात, त्यांना स्वस्वरूपानुभवामुळे मिळणारा परमानंद प्राप्त होतो. असे भाविकजन खरोखर अत्यंत धन्य होत. (१२)

जैसा भाव जयापासीं । तैसा दैव तयासी ।
जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणीमात्रांचा ॥ १३॥

ज्याचा जसा भाव असतो तसा देव त्याच्याशी वागतो. कारण प्राणिमात्रांच्या अंतर्यामीच भगवान असल्याने त्यांच्या हृदयातील भाव तो अचूक जाणतो. (१३)

जरी भाव असिला माईक । तरी देव होये माहा ठक ।
नवल तयाचें कौतुक । जैशास तैसा ॥ १४॥

भाव जर दिखाऊ असेल तर देवही महाठक होतो. देवाचे हे विशेष कौतुक आहे की, तो जशास तसा वागतो. (१४)

जैसें जयाचें भजन । तैसेंची दे समाधान ।
भाव होतां किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५॥

जशी ज्याची उपासना असेल तसे देव त्याला समाधान देतो. भावात जरा जरी उणीव आली तरी देव दुरावतो. (१५)

दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैस्यास तैसें भासे ।
तयाचें सूत्र असे । आपणाच पासीं ॥ १६॥

आरशात आपले प्रतिबिंब दिसते, ते बघणारा जसा असेल तसेच हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्यापाशीच असते. (१६)

जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें ।
जरी डोळे पसरूनि पाहावें । तरी तेंही टवकारे ॥ १७॥

आपण जशी हालचाल करू, तशीच ते प्रतिबिंब करते. आपण जर डोळे वटारून पाहू लागलो, तर प्रतिबिंबही डोळे वटारून आपल्याकडे पाहाते. (१७)

भृकुटीस घालून मिठी । पाहातां क्रोधें तेंहि उठी ।
आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८॥

आपण जर रागाने कपाळाला आठ्या घालून भुवया चढवून पाहू लागलो, तर तेही क्रोधाने आपल्याकडे पाहू लागते. आपण जर हसून पाहिले तर तेही पोटी आनंदलेले दिसते. (१८)

जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाचि देव जाला ।
जो जैसें भजे त्याला । तैसाचि वोळे ॥ १९॥

ज्याचा जसा भाव असतो, त्या भावाचे प्रतिबिंब असे त्याच्या देवाचे रूप होते. जो त्याला जसा भजतो त्याप्रमाणे तो तसाच प्रसन्न होतो. (१९)

भावें परामार्थाचिया वाटा । वाहाती भक्तीचिया पेंठा ।
भरला मोक्षाचा चोहाटा । सज्जनसंगें ॥ २०॥

भावामुळेच परमार्थाच्या वाटा भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत येऊन पोहोचतात. तेथे संतसज्जनांच्या संगतीत मोक्षाचा चव्हाट्यावर बाजार भरलेला असतो. (२०)

भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरी पावन जाले ।
भावार्थबळें उद्धरिले । पूर्वज तेहीं ॥ २१॥

खऱ्या भक्तिभावनेने जे भगवद्‌भजन करतात, ते भगवंताशी एकरूप होऊन पावन होतात. त्यांनी भावार्थाच्या बळावर आपल्या पूर्वजांचाही उद्धार केलेला असतो. (२१)

आपण स्वयें तरले । जनासहि उपेगा आले ।
कीर्तिश्रवणें जाले । अभक्त, भावार्थी ॥ २२॥

असे भक्त स्वतःही तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात, त्यांच्या तोंडून भगवंताची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात, तेही भावार्थी बनतात. (२२)

धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं ।
तेहिंच येक जन्म जनीं । सार्थक केला ॥ २३॥

जे हरिभजनी लागतात, देवाची भक्ती करू लागतात त्यांची जननी धन्य समजावी. त्यांनीच जगात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावलेला असतो. (२३)

तयांची वर्णूं काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी ।
कासे लाऊन उतरी । पार दुःखाचा ॥ २४॥

ज्यांचा कैवार प्रत्यक्ष भगवंत घेतो व स्वतः आपल्या कासेला लावून दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो, त्यांची थोरवी काय वर्णावी बरे ? (२४)

बहुतां जन्मांचे सेवटीं । जेणें चुके अटाटी ।
तो हा नरदेह भेटी । करी भगवंतीं ॥ २५॥

अनेक जन्मांच्या शेवटी ह्या नरदेहाची प्राप्ती होते. त्यायोगे सर्व यातायात चुकते. एवढेच नव्हे तर या देहातच भगवद्‌दर्शन, होऊ शकते. (२५)

म्हणौन धन्य ते भाविक जन । जेंहिं जोडिलें हरिनिधान ।
अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि आलें ॥ २६॥

म्हणून ज्यांनी हरिरूपी संपत्ती जोडली, ते भाविक जन धन्य आहेत. त्यांच्या अनंत जन्मांतरींचे पुण्य फळास आले असे समजावे. (२६)

आयुष्य हेचि रत्नपेटी । माजीं भजनरत्नें गोमटीं ।
ईश्वरीं अर्पूनिया लुटी । आनंदाची करावी ॥ २७॥

मानवाचे आयुष्य ही ज्यात सुंदर अशी भजनरत्‍ने भरलेली आहेत, अशी रत्नपेटीच आहे. यातील भजनरूपी रत्‍ने ईश्वरास अर्पण करून मानवाने आनंदाची लयलूट करावी. (२७)

हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ ।
सदा सर्वदा संतुष्ट । नैराशबोधें ॥ २८॥

हरिभक्त हा लौकिक वैभवाच्या दृष्टीने कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादी देवांपेक्षा वरिष्ठ समजावा. कारण तो दुर्लभ अशा अनासक्तीने सदासर्वदा संतुष्ट असतो. (२८)

धरून ईश्वराची कास । केली संसाराची नैराश ।
तयां भाविकां जगदीश । सबाह्य सांभाळी ॥ २९॥

जो संसारातील कुणाचीही आणि कशाचीही आशा न बाळगता केवळ ईश्वरावर विसंबून त्यास सर्वभावे शरण जातो, त्या भाविकांचा जगदीश आत व बाहेर सांभाळ करतो. (२९)

जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परमसुख ।
संसारसुखाचेनि पढतमूर्ख । लोधोन पडती ॥ ३०॥

ज्याला संसारातील दुःखही विवेकाच्या योगे परम सुखच वाटते, जे पढतमूर्ख असतात, ते मात्र संसारसुखाच्या आशेने संसारातच आसक्त होतात. (३०)

जयांचा ईश्वरीं जिव्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा ।
जयांचा जनावेगळा । ठेवा आक्षै ॥ ३१॥

ज्यांना ईश्वराविषयी आत्यंतिक प्रेम असते ते भक्त स्वानंद-सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो. पण तो सामान्य जनांच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. (३१)

ते आक्षै सुखें सुखावले । संसारदुःखें विसरले ।
विषयेरंगी वोरंगले । श्रीरंगरंगीं ॥ ३२॥

ते अक्षय सुखाने सुखावून संसारदुःखे विसरून जातात. ते निरिच्छ होतात आणि श्रीभगवंताच्या प्रेमात रंगून जातात. (३२)

तयांस फावली नरदेह पेटी । केली ईश्वरेंसिं साटी ।
येरें अभाविकें करंटीं । नरदेह गेला ॥ ३३॥

ज्यांनी देहबुद्धी देऊन ईश्वर मिळविण्याची अदलाबदल केली, त्यांनी या नरदेहाचे सार्थक केले. ही नरदेहरूपी रत्‍नपेटी त्यांनाच लाभली असे म्हणावे लागते. इतर अभागी अभाविक आपला मनुष्यदेह वाया चघालवितात (३३)

आवचटें निधान जोडलें । तें कवडिच्या बदल नेलें ।
तैसें आयुष्य निघोनि गेलें । अभाविकाचें ॥ ३४॥

अकस्मात एखाद्यास रत्‍न सापडले असता त्याने ते कवडीच्या बदल्यात घालवावे तसे अश्रद्ध लोकांचे आयुष्य कवडीमोलाने निघून जाते. (३४)

बहुता तपाचा सांठा । तीणें लाधला परीस गोटा ।
परी तो ठा‍ईंचा करंटा । भोगूंच नेणे ॥ ३५॥

एखाद्याने खूप तप करावे आणि त्याचे फळ म्हणून त्याल परिस मिळावा, पण मुळातच तो अत्यंत अभागी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्याला कळत नाही. (३५)

तैसा संसारास आला । मायाजाळीं गुंडाळला ।
अंतीं येकलाचि गेला । हात झाडुनी ॥ ३६॥

त्याप्रमाणे जो या संसारात मनुष्य म्हणून जन्मूनही मायेच्या पाशात गुंडाळला जातो आणि अखेर हात झाडून सर्व काही इथेच सोडून एकटाच निघून जातो (३६)

या नरदेहाचेनि संगतीं । बहुत पावले उत्तम गती ।
येकें बापुडी यातायाती । वरपडी जालीं ॥ ३७ ॥

या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम गतीची प्राप्ती करून घेतली, पण काही बिचारे यातायातीतच गुंतले आणि दुःखी झाले. (३७)

या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावे संतसंगें ।
नीचयोनीं दुःख मागें । बहुत भोगिलें ॥ ३८॥

या उत्तम नरदेहाचे संतसमागम करून शक्य तितक्या लवकर सार्थक करावे. मागे अनेक नीचयोनीत आपण खूप भोगलेले आहे, याचे स्मरण ठेवावे. (३८)

कोण समयो ये‍ईल कैसा । याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥ ३९॥

केव्हा कशी वेळ येईल याचा भरवसा नसतो. आपण ते जाणूही शकत नाही. पक्षी जसे रात्री एखाद्या वृक्षावर एकत्र जमतात व प्रातःकाळ होताच दाही दिशांना उडून जातात, त्याप्रमाणे मानवी जीवनही आहे. (३९)

तैसें वैभव हें सकळ । कोण जाणे कैसी वेळ ।
पुत्रकळत्रादि सकळ । विघडोन जाती ॥ ४०॥

तसेच हे वैभवादी सर्व जाणावे. केव्हा कशी वेळ येईल, हे कोणीही जाणू शकत नाही. वाईट वेळ आली तर बायकोमुले वगैरे सर्व सोडून जातात अथवा एखादे वेळी नष्टही होतात. (४०)

पाहिली घडी नव्हे आपुली । वयसा तरी निघोन गेली ।
देह पडतांच ठेविली- । आहे नींच योनी ॥ ४१॥

जो क्षण येताना आपण पाहतो, तो लगेच आपल्या हातून निसटून जातो. अशा प्रकारे बघता बघता आयुष्य निघून जाते आणि हा स्थूल देह पडला की नीच योनी प्राप्त होते. (४१)

स्वान शुकरादिक नीच याती । भोगणें घडे विपत्ती ।
तेथे कांहीं उत्तम गती । पाविजेत नाहीं ॥ ४२॥

कुत्रा, डुक्कर इत्यादी नीच योनीत जन्म होतो आणि दुःख भोगावे लागते. त्या योनीत गेल्यावर उत्तम गती मिळणे अशक्यच असते. (४२)

मागा गर्भवासीं आटाटी । भोगितां जालासि रे हिंपुटी ।
तेथुनियां थोरा कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३॥

मागे गर्भवासात यातना भोगताना जीव कष्टी झालेला असतो. त्यातून सुदैवाने अत्यंत कष्टाने एकदाची सुटका होते. (४३)

दुःख भोगिलें आपुल्या जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें ।
तैचेंचि पुढें येकलें जावें । लागेल बापा ॥ ४४॥

गर्भवासात जेव्हा जीव दुःख भोगतो, तेव्हा कुणी मदतीला येऊ शकत नाही. तसेच पुढे आयुष्याच्या शेवटीही जीवाला एकटेच जावे लागणार आहे ! ‘ अरे बाबा, हे लक्षात घे. ‘ (४४)

कैंचि माता कैंचा पिता । कैंचि बहिण कैंचा भ्राता ।
कैंचीं सुहृदें कैंची वनिता । पुत्रकळत्रादिक ॥ ४५॥

कुठली आई आणि कुठला बाप, कुठली बहीण आणि कुठला भाऊ ! कुठले मित्र आणि कुठली बायको ! कुठली मुलेबाळे व इतर नातेवाईक ! (४५)

हे तूं जाण मावेचीं । आवघीं सो‍इरीं सुखाचीं ।
हे तुझ्या सुखदुःखाचीं । सांगाती नव्हेती ॥ ४६॥

ही सर्व मायिक आहेत, हे तू जाणून घे. सगळी त्यांच्या त्यांच्या सुखाच्या आशेने तुझ्याभोवती गोळा झालेली आहेत. ही तुझ्या सुख-दुःखात तुला साथ देऊ शकत नाहीत. (४६)

कैंचा प्रपंच कैंचे कुळ । कासया होतोसी व्याकुळ ।
धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें ॥ ४७॥

कसला प्रपंच आणि कसले कुळ ! त्यासाठी कशाला व्याकुळ होतोस ? धनधान्य, ऐश्वर्य आदी सर्व अशाश्वत आहे. (४७)

कैंचें घर कैंचा संसार । कासया करिसी जोजार ।
जन्मवरी वाहोन भार । सेखीं सांडून जासी ॥ ४८॥

कसले घर आणि कसला संसार ! उगीच कशाला यातायात करतोस ? जन्मभर त्यांचे ओझे वाहून अखेर ते सर्व सोडून जावेच लागते. (४८)

कैंचें तारुण्य कैंचे वैभव । कैंचें सोहळे हावभाव ।
हें सकळहि जाण माव । माईक माया ॥ ४९॥

कसले तारुण्य, कसले वैभव ! कसले सोहळे आणि कसले हावभाव ! हे सर्व मायिक आहे आणि भुलवून मायेच्या पाशात अडकविणारे आहे, हे जाणून घे. (४९)

येच क्षणीं मरोन जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी ।
माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां ॥ ५०॥

याच क्षणी मरून गेलास, तर रघुनाथाला अंतरलास असे समज. कारण हा देह, संसार यांना तू माझे-माझे म्हणतोस, म्हणून मी तुला हे सांगतो. (५०)

तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसीं मायबापें किती ।
स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥ ५१॥

तू आत्तापर्यंत किती जन्म घेतलेस ! त्यावेळी असे आईवडील वगैरे किती झाले ? स्त्री, पुत्र, कन्या वगैरेंची गणती करू लागल्यास लक्षावधी संख्या भरेल. (५१)

कर्मयोगें सकळ मिळालीं । येके स्थळीं जन्मास आलीं ।
तें तुवां आपुलीं मानिलीं । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२॥

पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने सर्व एका स्थळी जमतात, एका स्थळी जन्म घेतात, ती तू आपली कशी रे मानलीस, पढतमूर्खा ! (५२)

तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार ।
आतां येक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३॥

तुझे म्हणून तुला वाटणारे हे शरीरही जर तुझे नाही, तर इतरांचा कसला विचार करायचा ? आता खरोखर मनःपूर्वक एका भगवंतालाच भावार्थाच्या बळाने घट्ट धरून ठेव. (५३)

येका दुर्भराकारणें । नाना नीचांची सेवा करणें ।
नाना स्तुती आणी स्तवनें । मर्यादा धरावी ॥ ५४॥

आपल्या कधीही न भरणाऱ्या पोटासाठी आपल्याला अनेक नीच लोकांची सेवा करावी लागते. त्यांची स्तुतिस्तोत्रे गाऊन त्यांच्यापुढे मर्यादेने वागावे लागते. (५४)

जो अन्न देतो उदरासी । शेरीर विकावें लागे त्यासी ।
मां जेणें घातलें जन्मासी । त्यासी कैसें विसरावें ॥ ५५॥

जो पोटाला अन्न देतो, त्याच्या सेवेत मानवी शरीर विकावे लागते. मग ज्याने हा दुर्लभ मनुष्य देह दिला, त्याला कसे काय विसरावे ? (५५)

अहिर्निशीं ज्या भगवंता । सकळ जिवांची लागली चिंता ।
मेघ वरुषे जयाची सत्ता । सिंधु मर्यादा धरी ॥ ५६॥

ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली असते व ज्याच्या सत्तेने मेघ जलवृष्टी करतात, समुद्र आपली मर्यादा सांभाळतो, (५६)

भूमि धरिली धराधरें । प्रगट हो‍ईजे दिनकरें ।
ऐसी सृष्टी सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७॥
ऐसा कृपाळु देवाधिदेव । नेणवे जयाचें लाघव ।
जो सांभाळी सकळ जीव । कृपाळुपणें ॥ ५८॥

शेष पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करतो, सूर्य उदयास येतो, असा आपल्या सत्तामात्रेकरून जो सर्व वृष्टी चालवितो, असा परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. त्याची लीला जाणता येत नाही. कृपाळूपणे तोच सर्व जीवांचा सांभाळ करीत असतो. ५७ -८८

ऐसा सर्वात्मा श्रीराम- । सांडून, धरिती विषयकाम ।
ते प्राणी दुरात्मे अद्धम । केलें पावती ॥ ५९॥

अशा सर्वांच्या अंतर्मायी आत्मरूपाने असलेल्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषयांची इच्छा करतात, ते अत्यंत अधम दुरात्मे स्वतःच्या केलेल्या कर्मांची फळेच भोगत असतात. (५९)

रामेविण जे जे आस । तितुकी जाणावी नैराश ।
माझें माझें सावकाश । सीणचि उरे ॥ ६०॥

रामाशिवाय जी जी इच्छा करावी ती ती निरर्थकच जाणावी. ‘माझे, माझे’ करता करता शेवटी कष्टच उरतात. (६०)

जयास वाटे सीण व्हावा । तेणें विषयो चिंतीत जावा ।
विषयो न मिळतां जीवा । तगबग सुटे ॥ ६१॥

ज्याला कष्टच व्हावे असे वाटत असेल, त्याने सतत विषयांचेच चिंतन करावे. विषयाची प्राप्ती झाली नाही की, जीवाची अगदी तगमग होते. (६१)

सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥ ६२॥

आनंदघन म्हणजे मूर्तिमंत आनंदच अशा रामाचे चिंतन करावयाचे सोडून जो मनात सतत विषयाचे चिंतन करतो, त्या विषयासक्त माणसाला समाधान कसे प्राप्त होणार ? (६२)

जयास वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनीं लागावें ।
स्वजन सकळही त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३॥

ज्याला आपल्याला सदैव सुखच लाभावे असे वाटत असेल त्याने रघुनाथभजनी लागावे आणि जे दुःखाचे मूळ आहेत, अशा सर्व स्वजनांचा त्याग करावा. (६३)

जेथें वासना झोंबोन पडे । तेणेंचि अपायें दुःख जडे ।
म्हणौनि विषयवासना मोडे । तो येक सुखी ॥ ६४॥

ज्या वस्तू अथवा व्यक्तीच्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडते, तेथे जीवाला अपाय होतो व दुःखच प्राप्त होते. म्हणून ज्याची विषयवासना नाहीशी होते, तोच माणूस सुखी होतो. (६४)

विषयजनित जें जें सुख । तेथेंचि होतें परम दुःख ।
पूर्वीं गोड अंतीं शोक । नेमस्त आहे ॥ ६५॥

विषयांपासून जे जे सुख मिळावे अशी माणूस इच्छा करतो, तेच त्याच्या परमदुःखास कारणीभूत होते. पहिल्याने ते गोड वाटते, पण परिणामी शोकदायकच ठरते, असे निश्चितपणे समजावे. (६५)

गळ गिळितां सुख वाटे । वोढून घेतां घसा फाटे ।
कां तें बापुडें मृग आपटे । चारा घे‍ऊन पळतां ॥ ६६॥

माशाला गळ गिळताना त्याला लावलेल्या आमिषाच्या लोभामुळे प्रथम सुख वाटते. नंतर तो गळ जेव्हा ओढून घेतला जातो, तेव्हा त्याचा घसा फाटून मृत्यू ओढवतो किंवा हरीण हिरवा चारा तोंडात घेऊन पळत असता बिचारे दगडावर आपटते व तोंड फोडून घेते. (६६)

तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी ते कुडी ।
म्हणौनियां आवडी । रघुनाथीं धरावी । ६७॥

त्याप्रमाणेच विषयसुखाचे आहे. पहिल्याने ते गोड वाटते, पण अंती ते वाईट परिणाम करणारे ठरते. म्हणून रघुनाथ भजनाचीच आवड धरावी. (६७)

ऐकोनि बोले भाविक । कैसेनि घडे जी सार्थक ।
सांगा स्वामी येमलोक । चुके जेणें ॥ ६८॥

समर्थांनी केलेला हा उपदेश ऐकून भाविक त्यांना विनंती करू लागले की, स्वामी ! या नरदेहाचे सार्थक कशाने होईल आणि यमलोकापासून सुटका कशी होईल हे आपण कृपा करून सांगावे. (६८)

देवासी वास्तव्य कोठें । तो मज कैसेंनि भेटे ।
दुःखमूळ संसार तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९॥

देव कोठे राहतो, मला तो कसा भेटेल, दुःखमूळ असा हा संसार काय केल्याने नष्ट होईल हे स्वामी ! मला हे सर्व सांगा. (६९)

धडपुडी भगवत्प्राप्ती- । हो‍ऊन, चुके अधिगती ।
ऐसा उपाये कृपामूर्ती । मज दीनास करावा ॥ ७०॥

प्रत्यक्ष भगवत्‌प्राप्ती होऊन अधोगती चुकेल असा उपाय कृपामूर्ती अशा आपण मज दीनाला सांगावा. (७०)

वक्ता म्हणे हो येकभावें । भगवद्भजन करावें ।
तेणें हो‍ईल स्वभावें । समाधान ॥ ७१॥

तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की, एकनिष्ठ भावाने भगवद्‌भजन करावे म्हणजे त्यायोगे अगदी सहज समाधान प्राप्त होईल. (७१)

कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन ।
भगवद्भजनाचें लक्षण । मज निरोपावें ॥ ७२॥

तेव्हा श्रोता विचारतो की, भगवद्‌भजन कसे करावे ? मन कुठे एकाग्र करावे ? भगवद्‌भजनाचे लक्षण काय ? हे सर्व आपण मला समजावून द्यावे. (७२)

ऐसा म्लानवदनें बोले । धरिले सदृढ पाऊलें ।
कंठ सद्गनदित, गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३॥

असे म्लान वदनाने म्हणून श्रोत्याने वक्त्याची पावले सुदृढपणे धरली. त्याचा कंठ सद्‌गदित होऊन, दुःखाने डोळ्यांतून अश्रू गळू लागले. (७३)

देखोन शिष्याची अनन्यता । भावें वोळला सद्गु्रु दाता ।
स्वानंद तुंबळेल आतां । पुढिले समासीं ॥ ७४॥

ही शिष्याची अनन्यता पाहून व त्याचा एकनिष्ठ भाव पाहून सद्‌गुरू प्रसन्न झाले व ज्ञान देण्यास उत्सुक झाले. आता पुढील समासात या गुरुशिष्यांच्या संवादात स्वानंद उचंबोळून येईल. (७४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
वैराग्यनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘वैराग्यनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक तीसरा समाप्त ॥

श्रीमत् दासबोध

दशक चवथा : नवविधा भक्ती

समास पहिला : श्रवणभक्ती

श्रीराम

जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था ।
अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, श्री गणनाथाचा जयजयकार असो. हे गणनाथा, तू विद्यावैभवाने संपन्न असून ती दुसऱ्यास देण्याचे सामर्थ्यही तुजपाशी आहे. अध्यात्मविद्येचे रहस्य असा जो परमार्थ तो माझ्याकडून आपणच वदवून घ्यावा. (१)

नमूं शारदा वेदजननी । सकळ सिद्धि जयेचेनी ।
मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २॥

वेदजननी जी शारदा तिला मी वंदन करतो. तिच्या कृपेने सर्व कार्ये सिद्धीला जातात. तिच्या कृपेनेच स्फूर्तिरूपाने माझे मन चिंतनात प्रवर्तले आहे. (२)

आतां आठऊं सद्गु रु । जो पराचाहि परु ।
जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥ ३॥

नंतर श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ अशा श्रीसद्‌गुरूचे स्मरण करू. कारण गुरुकृपेमुळेच ज्ञानविचार कळू लागतो. (३)

श्रोतेन पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें ।
म्हणौनि बोलिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४॥

श्रोत्यांनी चांगला प्रश्न केला आहे की, भगवद्‌भजन कसे करावे ? म्हणून स्वाभाविकच निरनिराळ्या ग्रंथांतील भगवद्- भजनासंबंधीची वचने येथे सांगतो. (४)

सावध हो‍ऊन श्रोतेजन । ऐका नवविधा भजन ।
सत्शाहस्त्रीं बोलिले, पावन- । हो‍ईजे येणें ॥ ५॥

तरी श्रोत्यांनी सावध होऊन नवविधा भक्तीसंबंधी सतूशास्त्रात जे वर्णन आले आहे ते ऐकावे व त्यायोगे पावन व्हावे. (५)

श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥

अर्थ- श्रवण, कीर्तन, श्री विष्णूचे नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत. (१)

नवविधा भजन बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें ।
श्रोतीं अवधान दिधलें । पाहिजे आतां ॥ ६॥

याप्रमाणे शास्त्रात जे नऊ प्रकारचे भजन सांगितले आहे, त्याचेच सविस्तर वर्णन पुढे केले आहे. तरी श्रोत्यांनी आता नीट लक्ष द्यावे. (६)

प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथापुराणश्रवण ।
नाना अध्यात्मनिरूपण । ऐकत जावें ॥ ७॥

नऊ प्रकारांपैकी पहिले भजन कसे असते, ते ऐकावे. भगवंतांच्या कथा ऐकाव्यात, पुराण श्रवण करावे आणि नाना प्रकारे अध्यात्मनिरूपण केले जाते, तेही ऐकावे. (७)

कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ८॥

कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धान्तमार्ग योगमार्ग, वैरुग्यमार्ग इत्यादी सर्वांचे श्रवण करीत जावे. (८)

नाना व्रतांचे महिमे । नाना तीर्थांचे महिमे ।
नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ ९॥

नाना व्रतांचे महत्त्व, नाना तीर्थांचे महत्त्व व नाना दानांचे माहात्म्य ऐकत जावे. (९)

नाना माहात्म्यें नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें ।
नाना तपें पुरश्चरणें । ऐकत जावीं ॥ १०॥

नाना माहात्म्ये, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना प्रकारचे तप व नाना पुरश्चरणे यासंबंधीचे वर्णन ऐकत जावे. (१०)

दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी ।
तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ ११॥

दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पानाहारी, तृणाहारी असे नाना प्रकारचे आहार घेणारे लोक कसे असतात, ते ऐकावे. (११)

उष्णवास जळवास । सीतवास आरण्यवास ।
भूगर्भ आणी आकाशवास । कैसे ते ऐकावे ॥ १२॥

कुणी उन्हात राहणारे, कुणी पाण्यात राहणारे, कुणी थंडीत शहणारे, कुणी अरण्यात राहणारे, तर कुणी जमिनीत खड्डा खणून त्यात राहणारे, तर कुणी आकाशात राहणार कसे असतात, ते ऐकावे. (१२)

जपी तपी तामस योगी । नाना निग्रह हटयोगी ।
शाक्तआगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ॥ १३॥

जप करणारे तप करणारे, अत्यंत तापट असणारे योगी, नाना प्रकारे निग्रह करणारे हठयोगी, शक्तिउपासक व कापालिक कसे असतात, ते सर्वही ऐकावे. (१३)

नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्षस्थानें ।
पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तें ऐकावीं ॥ १४॥

योगशास्त्रात वर्णिलेल्या नाना मुद्रा, नाना आसने, नाना प्रकाशाची रूपे, ज्यावर मन सुलभतेने स्थिर करता येते अशी लक्ष्य स्थाने तसेच पिंडज्ञाने तत्त्वज्ञाने कशी आहेत तेही ऐकावे. (१४)

नाना पिंडांची रचना । नाना भूगोळरचना ।
नाना सृष्टीची रचना । कैसी ते ऐकावी ॥ १५॥

नाना प्राण्यांच्या शरीराची रचना, पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रदेशांची रचना, नाना वृष्टीची रचना कशी झाली आहे, तेही ऐकावे. (१५)

चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें मेघमंडळें ।
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । कैसीं ते ऐकावीं ॥ १६॥

चंद्र, सूर्य, तारांचे समूह, विविध ग्रहांचे समुदाय, मेघांचे समुदाय, एकवीस स्वर्ग आणि सक्षपाताळ यांचे विवरणही ऐकावे. (१६)

ब्रह्माविष्णुमहेशस्थानें । इन्द्रदेवऋषीस्थानें ।
वायोवरुणकुबेरस्थानें । कैसीं ते ऐकावीं ॥ १७ ।

ब्रह्मा, विष्णू महेश यांची स्थाने, तसेच इंद्र, देव, ऋषी यांची स्थाने, वायू वरुण, कुबेर यांची स्थाने कशी आहेत तेही ऐकावे. (१७)

नव खंडे चौदा भुवनें । अष्ट दिग्पाळांची स्थानें ।
नाना वनें उपवनें गहनें । कैसीं ते ऐकावीं ॥ १८॥

नऊ खंडे चौदा भुवने, अष्ट दिक्पालांची स्थाने, तसेच नाना वने, उपवने, गहन अरण्ये यांची माहितीही ऐकावी. (१८)

गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर ।
अष्ट नायका संगीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ १९॥

शिवगण, देवगण, गंधर्व, विद्याधर यक्ष, किन्नर, नारद, तुंबर इत्यादींची माहिती, तसेच अष्टनायिका आणि संगीतशास्त्र यांची माहितीही ऐकावी. (१९)

रागज्ञान ताळज्ञान । नृत्यज्ञान वाद्यज्ञान ।
अमृतवेळ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २०॥

रुगज्ञान, तालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, मुहूर्तज्ञान, प्रसंगज्ञान कसे असते, तेही ऐकावे (२०)

चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा ।
बत्तीस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥ २१॥

चौदा विद्या, चौसष्ट कला, हातावरील रेषांची लक्षणे, इतर कला, व माणसाच्या अंगी असणारी बत्तीस लक्षणे, वगैरे नाना कलांची माहिती ऐकावी. (२१)

मंत्र मोहरे तोटके सिद्धी । नाना वल्ली नाना औषधी ।
धातु रसायण बुद्धी । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २२॥

मंत्र, विविधतोडगे, सर्व सिद्धी, नाना औषधी, मणी, नाना वल्ली, विविध धातू विविध रसायने तयार करण्याच्या क्रिया, नाडी परीक्षा इत्यादी गोष्टीही ऐकाव्यात. (२२)

कोण्या दोषें कोण रोग । कोणा रोगास कोण प्रयोग ।
कोण्या प्रयोगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २३॥

कुठल्या दोषामुळे कुठला रोग होतो, कुठल्या रोगावर कुठल्या औषधाचा प्रयोग करावा, कुठल्या प्रयोगात कुठल्या योगावर आरंभ केला असता तो सिद्धीस जातो, हे सर्व ऐकून घ्यावे. (२३)

रवरवादि कुंभपाक । नाना यातना येमेलोक ।
सुखसुःखादि स्वर्गनर्क । कैसा तो ऐकावा ॥ २४॥

रौरव नरक, कुंभपाक नरक, इत्यादी नाना यातना ज्यात भोगाव्या लागतात ते सर्व नरक, तसेच यमलोक कसा आहे, स्वर्गातील सुख व नरकातील दुःख कसे असते, तेही सर्व ऐकावे. (२४)

कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती ।
कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें ॥ २५॥

नवविधा भक्ती कोणत्या आहेत, चार प्रकारच्या मुक्ती कोणत्या आहेत, उत्तम गती प्रास होण्यासाठी काय करावे, हे सर्व ऐकून घ्यावे. (२५)

पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवंचना ।
सारासारविचारणा । कैसी ते ऐकावी ॥ २६॥

पिंडब्रह्मांडाची रचना, नाना तत्त्वविवंचना तसेच सारासार विचार म्हणजे काय हेही ऐकावे (२६)

सायोज्यता मुक्ती कैसी होते । कैसें पाविजे मोक्षातें ।
याकारणें नाना मतें । शोधित जावीं ॥ २७॥

सायुज्यता मुक्ती कशी मिठ्ये, मोक्षाची प्राप्ती कशी होते, हे जाणून घेण्यासाठी नाना मतांचा शोध घ्यावा. (२७)

वेद शास्त्रें आणी पुराणें । माहावाक्याचीं विवरणें ।
तनुशतुष्टयनिर्शनें । कैसीं ते ऐकावीं ॥ २८॥

वेद, शाखे, पुतणे, महावाक्यावरील विवरणे तसेच चार देहांचे निरसन कसे करावे हे सर्व ऐकावे. (२८)

ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।
असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति ॥ २९॥

अशा रीतीने हे सर्व ऐकावे व विचार करून त्यातील सार शोधून काढावे व ते ग्रहण करावे. असार असेल ते जाणून घेऊन त्याचा त्याग करावा. यालाच श्रवणभक्ती असे नाव आहे. (२९)

सगुणाचीं चरित्रें ऐकावीं । कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं ।
श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं ॥ ३०॥

भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन ऐकावे तसेच त्याचे निर्गुण स्वरूपही तत्त्वमीमांसेने जाणून घ्यावे ही श्रवणभक्तीची लक्षणे होत. (३०)

सगुण देवांचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्वें यंत्रें ।
हे दोनी परम पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३१॥

भगवंताची सगुण चरित्रे व निर्गुणाची तत्त्वे, यंत्रे ही दोन्ही परम पवित्र असल्याने ती ऐकावीत. (३१)

जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र जप ध्यानें ।
कीर्ति स्तुती स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३२॥

सगुण भक्तीसाठी जयंत्या, उपोषणे, नाना साधने, नाना मंत्र, यंत्र, जप व ध्याने तसेच भगवंताची कीर्ती, त्याची स्तुतिस्तोत्रे, भजने यांचे विविध प्रकार हे सर्व काही ऐकावे. (३२)

ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें ।
विभक्ती सांडून भक्तीचें । मूळ शोधावें ॥ ३३॥

याप्रमाणे सगुणाचे श्रवण करावे आणि निर्गुणाचे अध्यात्मनिरूपणाच्या योगे ज्ञान करून घ्यावे थोडक्यात म्हणजे वेगळेपणाचा त्याग करून ऐक्यतेचे, भक्तीचे मूळ शोधावे, भगवंताशी एकरूपता कशी होईल हे जाणून घ्यावे. (३३)

श्रवणभक्तीचें निरूपण । निरोपिलें असे जाण ।
पुढें कीर्तन भजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३४॥

आत्तापर्यंत श्रवणभक्तीचे निरूपण केले. आता पुढे कीर्तनभजनाचे लक्षण सांगितले जाईल. (३४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रवणभक्तिनिरूपणनाम समास पहिला ॥ १॥

इति श्रीदासवोथे गुरुशिष्यसंवादे ‘श्रवणभक्तिनाम’ समास पहिला समास

GO TOP

समास दुसरा : कीर्तनभक्ती

॥ श्रीराम ॥

श्रोतीं भगवद्‌भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें ।
त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, श्रोत्यांनी भगवद्यजनासंबंधी प्रश्न केला. ते भगवद्‌भजन नऊ प्रकारचे आहे म्हणून सांगितले. प्रथम श्रवणाचे वर्णन केले. आता दुसरा प्रकार ‘ कीर्तन ‘ त्याचे वर्णन ऐका. (१)

सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ती वाढवावी ।
अक्षंड वैखरी वदवावी । येथायोग्य ॥ २॥

भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन करवे, नित्य हरिकथा र करावी. भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करावे, ती वाढवावी. आपल्या वैखरी वाणीचा अखंड यथायोग्य उपयोग करून भगवद्यणवर्णन तिचेकडून अखंड करवावे. (२)

बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर ।
भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३॥

खूप पाठांतर करावे, खूप ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सारांश कंठस्थ करावा व निरंतर भगवंताची कथा सांगत जावी. (३)

अपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा ।
हरिकथेवीण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४॥

स्वतःचे हित साधण्यासाठी, म्हणजेच मनुष्यजन्म सार्थकी लावून भगवखती करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी. त्याशिवाय कधी राहूच नये. (४)

नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतचि करावा ।
हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥

हरिकथेत रोज नित्य नवा रस उत्पन्न होईल असा हव्यास धरावा. त्यासाठी खूपच प्रयत्न करावा. सर्व ब्रह्मांड हरिकीर्तनाने दुमदुमून सोडावे. (५)

मनापासून आवडी । जीवापासून अत्यंत गोडी ।
सदा सर्वदा तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६॥

हरिकीर्तनाची अगदी मनापासून आवड असावी. त्याची गोडी अगदी जीवाभावापासून असावी आणि सदासर्वदा हरिकीर्तनाचीच उत्कंठा असावी. (६)

भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तनें समाधान होये ।
बहुत जनासी उपाये । हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७॥

भगवंतास कीर्तन अत्यंत प्रिय आहे. कीर्तनानेच समाधान प्रास होते. श्रोता व वक्ता यांना समाधान देऊन बहुजनसमाजाचाही उद्धार होण्याकरिता कलियुगात हरिकीर्तन हाच उत्तम उपाय आहे. (७)

विविध विचित्रें ध्यानें । वर्णावीं आळंकार भूषणें ।
ध्यानमूर्ति अंतःकरणें- । लक्षून, कथा करावी ॥ ८॥

भगवंताच्या विविध आणि अद्‌भुत रूपांचे वर्णन करावे. त्याच्या वस्त्रालंकारांचे, भूषणांचे वर्णन अशा प्रकारे करावे की, अंतःकरणात ते ध्यान ठसले पाहिजे, अशा रीतीने भगवंताचे ध्यान मनात धरून कथा करावी. (८)

येश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा ।
जेणें भगवद्भkक्तांचा आत्मा । संतुष्ट होये ॥ ९॥

भगवंताचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा अत्यंत आवडीने अशा प्रकारे वर्णावा की, जेणेकरून तो ऐकत असता भगवद्‌भक्ताचा आत्मा संतुष्ट होईल. (९)

कथा अन्वय लापणिका । नामघोष करताळिका ।
प्रसंगें बोलाव्या अनेका । धात माता नेमस्त ॥ १०॥

भगवन् कथा सांगताना सुसंगती असावी. शब्दपांडित्य, वस्तूत्व असावे. अधूनमधून भगवंताच्या नामाचा घोष करावा. सर्वांनी रुळया वाजवाव्या. प्रसंगानुसार पुराणादी शास्त्रीय ग्रंथातून वर्णिलेले दृष्टान्तादी प्रसंग, तसेच प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे दृष्टान्त यांचा उपयोग विवेचन नीट समजण्याकरिता करावा. (१०)

ताळ मृदांग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान ।
नाना कथानुसंधान । तुटोंचि नेदावें ॥ ११॥

हरिकीर्तनात रंग भरण्यासाठी टाळ मृदुंग, संगीत, मृत्य, तानमान यांचा उपयोग करावा; पण या सगळ्यांमध्ये कथेचा मागचा, पुढचा संबंध तुटणार नाही, याची काळजी घ्यावी. (११)

करुणा कीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटें ।
श्रोतयांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२॥

कथा सांगताना करुण रसाचा आविष्कार व्हावा. करुणरसाचे लोट वाहतील अशी घडघडायने कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून यकावेत. (१२)

कंप रोमांच स्फुराणें । प्रेमाश्रुसहित गाणें ।
देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे ॥ १३॥

कंप, रोमांच, स्कृरण, प्रेमाधू इत्यादी अष्टसात्त्विक भाव प्रगटहोतील अशा प्रकारेकथा करावी. प्रेमाने भगवंताचे गुणगान करून देवद्वारी लोयंगणे, नमस्कार घालावेत. (१३)

पदें दोहडें श्लोक प्रबंद । धाटी मुद्रा अनेक छंद ।
बीरभाटिंव विनोद । प्रसंगें करावे ॥ १४॥

प्रसंगानुसार पदे, दोहे श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा, अनेक छंद, वीरश्री निर्माण करणारे भाषण व विनोद यांचा उपयोग करावा. (१४)

नाना नवरसिक श्रृंघारिक । गद्यपद्याचें कौतुक ।
नाना वचनें प्रस्ताविक । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५॥

कथेमध्ये रुंगाससकट नवरस असावेत. उत्तम गद्य- पद्य वाङ्मय बोलावे. शास्त्राधारे प्रसंगाला अनुसरून नाना वचने बोलावीत. (१५)

भक्तिज्ञान वैराग्य लक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।
साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावें ॥ १६॥

कीर्तनात भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची लक्षणे, तसेच नीती, न्याय व स्वधर्मरक्षण यासाठी काय करावे, विविध साधनमार्ग कोणते आहेत व परमात्मस्वरूप कसे आहे, यासंबंधीचे प्रांजळ निरूपण असावे. (१६)

प्रसंगें हरिकथा करावी । सगुणीं सगुणकीर्ति धरावी ।
निर्गुणप्रसंगें वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७॥

प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या सगुण चरित्राचे, कीर्तीचे वर्णन करावे, निर्गुणाचा प्रसंग असेल तर अध्यात्माचे निरूपण करून अध्यात्मविद्या वाढवावी. (१७)

पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- । निरूपण करावें नेमस्त ।
बहुधा बोलणें अव्यावेस्त । बोलोंचि नये ॥ १८॥

प्रथम पूर्वपक्ष त्यागून नंतरसिद्धान्त निरूपण नेमस्तपणे म्हणजे यथायोग्य रीतीने करावे. शक्य तो विषयाला सोडून अस्ताव्यस्त बोलूच नये. (१८)

करावें वेदपारायेण । सांगावें जनासी पुराण ।
मायाब्रह्मीचें विवरण । साकल्य वदावें ॥ १९॥

वेदांचे पारायण करावे, लोकांना पुराण सांगावे, तसेच माया-ब्रह्म यासंबंधीचे सांगोपांग विवरण करावे. (१९)

ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें ।
गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच नेदावी ॥ २०॥

ब्राह्मणधर्माचे आदराने रक्षण करावे, भगवंताची उपासना भजनाद्वारे रक्षण करावी आणि आपली गुरुपरंपस निर्धाराने टिकवून धरावी. तीस बाधा येऊ देऊ नये. (२०)

करावें वैराग्यरक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण ।
परम दक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१॥

वैराग्याचे रक्षण करावे, ज्ञानाचे लक्षण सांभाळावे, जो अत्यंत सावध व विचारवंत वक्ता असतो, त्याला हे सर्व जमते. (२१)

कीर्तन ऐकतां संदेह पडे । सत्य समाधान तें उडे ।
नीतिन्यायसाधन मोडे । ऐसें न बोलावें ॥ २२॥

कीर्तन ऐकून श्रोत्यांच्या मनातसदेहउत्यनहोईल आणि खयेखरचत्याचेसमाधाननष्टहोईलतसेचनीतिन्याय व साधन यात बाधा येईल, असे वक्ताने काहीही बोलू नये. (२२)

सगुणकथा या नांव कीर्तन । अद्वैत म्हणिजे निरूपण ।
सगुण रक्षून निर्गुण । बोलत जावें ॥ २३॥

सगुण कथेलाच कीर्तन असे म्हणतात. अद्वैताचे प्रति- पादन किंवा स्पष्टीकरण याला निरूपण म्हणतात; कीर्तनकाराने सगुणाचे महत्त्व रधून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. (२३)

असो वक्त्रु त्वाचा अधिकार । अल्पास न घडे सत्योत्तर ।
वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४॥

जो अल्प बुद्धीचा आहे, ज्याला अनुभव नाही, वस्तूत्व नाही, सर्व प्रकारे जो उणा आहे त्याला वस्तूत्वाचा अधिकार नसतो. जो खरोखर अनुभवी असेल तोच वक्ता होऊ शकतो. (२४)

सकळ रक्षून ज्ञान सांगे । जेणें वेदज्ञा न भंगे ।
उत्तम सन्मार्ग लागे । प्राणीमात्रासी ॥ २५॥

असा अनुभवी वक्ता सर्वांचे रक्षण करून ज्ञानाचे निरूपण करतो. ते अशा प्रकारे करतो की, वेदाज्ञेचा भंग न होता प्राणिमात्रांनी सन्मार्गास प्रवृत्त व्हावे. (२५)

असो हें सकळ सांडून । करावें गुणानुवादकीर्तन ।
या नांव भगवद्भंजन । दुसरी भक्ती ॥ २६॥

असो. हे सर्व राहू द्यावे. भगवंताच्या गुणानुवादाचे वारंवार कथन, गायन करणे यालाच दुसरे भगवद्धजन किंवा कीर्तनभक्ती असे म्हणतात. (२६)

कीर्तनें माहादोष जाती । कीर्तनें होये उत्तमगती ।
कीर्तनें भगवत्प्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ २७॥

कीर्तनाने मोठे दोष नाहीसे होतात, कीर्तनाने उत्तम गती मिळते; एवढेच नव्हे तर कीर्तनाने भगवसाक्षी होते, यात तिळमात्र संदेह नाही. (२७)

कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होये सत्पात्र ।
हरिकीर्तनें प्राणीमात्र । सुसिळ होती ॥ २८॥

कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस सत्पात्र बनतो, हरिकीर्तनाने सर्व भाविक श्रोते सदाचारी बनतात. (२८)

कीर्तनें अवेग्रता घडे । कीर्तनें निश्चये सांपडे ।
कीर्तनें संदेह बुडे । श्रोतयांवक्तयांचा ॥ २९॥

कीर्तनाने एकाग्रता साधते, कीर्तनाने भगवसाक्षीचा निश्चय दृढ होतो, कीर्तनाने श्रोत्यांचे व वक्तांचे सर्व संशय नष्ट होतात. (२९)

सदा सर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण ।
तेणें नारद तोचि नारायेण । बोलिजेत आहे ॥ ३०॥

ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद सदासर्वदा हरिकीर्तन करीत असतात, म्हणून लोक त्यांना नारायणरूप मानतात. (३०)

म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तनें संतोषे परमात्मा ।
सकळ तीर्थें आणी जगदात्मा । हरिकीर्तनीं वसे ॥ ३१॥

म्हणून कीर्तनाचा महिमा अवर्णनीय आहे. कारण कीर्तनाने परमात्म्याला आनंद होतो. किंबहुना सर्व तीर्थे आणि भगवंत हरिकीर्तनात प्रत्यक्ष राहातात. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कीर्तनभजननिरूपणनाम समास दुसरा ॥ २॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कीर्तनभक्तिनाम’ समास दुसरा समाप्त.

समास तिसरा : नामस्मरणभक्ती

॥ श्रीराम ॥

मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन ।
आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ती ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, यापूर्वी जी सकळांना पावन करते त्या कीर्तनभक्तीचे वर्णन केले. आता विष्णूचे स्मरण ही तिसरी भक्ती सांगतो, ती ऐका. (१)

स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।
नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥

भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपावे. नामस्मरणानेच समाधान प्रास होते. (२)

नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं ।
नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥

नित्य नेमाने प्रातःकाळी, मध्याहकाळी, सायंकाळी एवढेच नव्हे तर सर्वकाळ नामस्मरण करीत असावे. (३)

सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां ।
नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥

सुखाचा प्रसंग असो वा दुःखाचा प्रसंग असो, मनात उद्वेग, चिंता असो अथवा मन आनंदरूप असो. कुठल्याही प्रसंगी नामस्मरणाशिवाय राहूच नये. (४)

हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥

आनंदाचा प्रसंग असो किंवा संकटाचा प्रसंग असो, पर्वकाळ असो वा प्रयाणकाळ असो, विश्रांतीची वेळ असो अथवा झोपेची वेळ असो, सर्वकाळ नामस्मरण करावे. (५)

कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।
आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥

एखादी समस्या निर्माण झालेली असो, काही अडचण असो वा संकट असो किंवा संसारातील नाना खटपटी, लटपटी चाललेल्या असोत किंवा मनात कशाच्या तरी योगाने चिंता किंवा चुटपुट लागलेली असो, सर्व अवस्थांमध्ये नामस्मरण करीतच राहावे. (६)

चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥

चालताना, बोलताना उद्योगधंदा करताना, खाताना, जेवताना, सुखी असताना किंवा नाना उपभोग घेतानाही नाम कधी विसरू नये. (७)

संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥

काळगतीप्रमाणे कधी संपत्ती प्रास होईल तर कधी विपत्ती प्रास होईल, पण लौकिक स्थिती कशीही असली तरी त्यात खंड पडू देऊ नये. (८)

वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।
उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥

एखादे वेळी वैभव, सामर्थ्य, सत्ता आदी सर्व तसेच इतर प्रापंचिक पदार्थ यांची सुबत्ता झाली तरी त्या उत्कट भाग्यश्रीचा उपभोग घेत असताही नामस्मरण कधी सोडू नये. (९)

आधीं आवदसा मग दसा । अथवा दसे‍उपरी आवदसा ।
प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥

आधी वाईट परिस्थिती होती, पण नंतर परिस्थिती सुधारली अथवा याचे उलट आधी चांगली परिस्थिती होती ती जाऊन वाईट परिस्थिती आली, यांपैकी कुठलाही प्रसंग असो, पण प्रसंगी नाम मात्र कधी सोडू नये. (१०)

नामें संकटें नासतीं । नामें विघ्नें निवारती ।
नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११॥

नामाच्या योगे संकटे नाश पावतात, विध्यांचे निवारण होते आणि नामस्मरणाने माणूस श्रेष्ठ पदास पोहोचतो. (११)

भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिर्ह्हो ब्राह्मणसमंध ।
मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२॥

निष्ठेने नामस्मरण केले असता भूत, पिशाच्च इत्यादी नाना बाधा, नाना कपटे व ब्रह्मसमंध तसेच नाना मंत्रप्रयोग, व नाना प्रकारची करणी इत्यादींची पीडा टळते. (१२)

नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटकें नासती ।
नामें होये उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३॥

नामाने विष बाधत नाही, चेटूक जादूटोणा इत्यादींचा प्रभाव पडत नाही. ती नाहीशी होतात आणि अंतकाळी नामाच्या योगे उत्तम गती प्रास होते. (१३)

बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृधाप्यकाळीं ।
सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४॥

बालपणी, तरुणपणी, संकयच्याकाळी किंवा वृद्धपणी सदासर्वकाळ तसेच अंतकाल आला असताही नामस्मरण चालूच असावे. (१४)

नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेसी विश्वेश्वर ।
वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५॥

नामाचा यथार्थ महिमा शंकरच जाणतात. तो विश्वेश्वर काशीत मरणाऱ्या जीवांना रामनामाचा उपदेश देऊन मुक्ती प्रास करून देतो. रामनामाच्या प्रभावानेच वाराणसी हे मुक्तिक्षेत्र ठरले आहे. (१५)

उफराट्या नामासाठीं । वाल्मिक तरला उठा‍उठी ।
भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥

उलट्या रामनामाच्या जपाने वाल्मीकीचा उद्धार झाला. एवढेच नव्हे तर भविष्यकाळी होणाऱ्या श्रीशमचरित्राचे वर्णन केले त्याचाच शतकोटी विस्तार झालेला आहे. (१६)

हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला ।
नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥

हरिनामाच्या योगेच नाना संकटंतून सुटका होऊन प्रहाद उद्धरून गेला आणि पापी अजामीळ नारायणाच्या नामस्मरणाने पावन झाला. (१७)

नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले ।
माहापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥

नामाच्या प्रभावाने समुद्रात पाषाण तरले. असंख्य भक्त रामनामामुळे उद्धरून गेले. अत्यंत महापापी होते, ते परम पवित्र बनले. (१८)

परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें ।
नामस्मरण करितां, येमें- । बाधिजेना ॥ १९॥

परमेश्वराची अनंत नामे आहेत. त्यातील एखाद्या नामाचे नित्यनेमाने प्रेमाने स्मरण केले असता माणूस उद्धरून जातो. नामस्मरणाच्या प्रभावाने यमयातना भोगाव्या लागत नाहीत. (१९)

सहस्रा नामामधें कोणी येक । म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्लोक । हो‍ईजे स्वयें ॥ २०॥

भगवंताच्या हजारो नामांपैकी कोणतेही एक नाम निष्ठेने घेत राहिल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होते. नामस्मरण केल्याने ते करणारा स्वत: पुण्यात्मा बनतो. (२०)

कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥

इतर काहीही साधना न करता स्वतः फक्त रामनामाचा अखंड जप जर कुणी करीत राहील, तर त्यामुळे भगवान चक्रपाणी अत्यंत संतुष्ट होतात आणि त्या भक्ताचा सर्व प्रकारे सांभाळ करतात. (२१)

नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर ।
माहादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२॥

जो मनुष्य निरंतर नामस्मरण करतो, त्याचे शरीरही त्या नामाच्या प्रभावाने पुण्यमय होऊन जाते. रामनामामुळे महादोषांचे उतुंग पर्वतही नाश पावतात. (२२)

अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला ।
हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥

नामाचा महिमा अगाध आहे. त्याचे संपूर्ण वर्णन करताच येणार नाही. नामामुळे अनेक लोकांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष चंद्रमौळी शकरानादेखील हलाहल विषाची बाधा झाली नाही. (२३)

चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर ।
जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४॥

नामाचा अधिकार चारी वर्णाच्या लोकांना आहे. नामस्मरणाच्या बाबतीत लहान, थोर हा भेद नाही. अगदी जड छ, अडाणी, मूर्ख माणसेही नामामुळे सुखाने पैलतीर गाठतात. (२४)

म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें ।
तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५॥

म्हणून अखंड नामस्मरण करीत राहावे व त्याचे रूप मनात आठवावे. ही तिसरी भक्ती होय. तिचे येथे यथार्थ वर्णन केले आहे, असे श्रीसमर्थ म्हणतात. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नामस्मरणभक्तिनिरूपणनाम समास तिसरा ॥ ३॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘नामस्मरणभक्तिनाम’ समास तिसरा समाप्त.

समास चौथा : पादसेवनभक्ती

॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । नामस्मरणाचें लक्षण ।
आतां ऐका पादसेवन । चौथी भक्ती ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात नामस्मरणभक्तीच्या लक्षणांचे निरूपण केले आता चौथी भक्ती जी पादसेवन तिचे लक्षण ऐका. (१)

पादसेवन तेंचि जाणावें । कायावाचामनोभावें ।
सद्गुaरूचे पाय सेवावे । सद्गणतिकारणें ॥ २॥

कायावाचामनोभावाने सद्‌गतिप्रासीसाठी श्रीसद्‌गुरूच्या चरणकमलांची सेवा करणे, ही पादसेवनभक्ती जाणावी. (२)

या नांव पादसेवन । सद्गुसरुपदीं अनन्यपण ।
निरसावया जन्ममरण । यातायाती ॥ ३॥

जन्ममरणाची यातायात कायमची चुकावी, म्हणून सद्‌गुरुचरणी अनन्य होणे यालाच पादसेवन म्हणतात. (३)

सद्गुरुकृपेविण कांहीं । भवतरणोपाव तों नाहीं ।
याकारणें लवलाहीं । सद्गुुरुपाय सेवावे ॥ ४॥

सद्‌गुरुकृपेशिवाय दुसरा काहीही भवतरणोपाय नाही हेजाणून घेऊन शक्य तितक्या लवकर श्रीसद्यरूंच्या चरणांची सेवा करू लागावे. (४)

सद्वस्तु दाखवी सद्गुसरु । सकळ सारासारविचारु ।
परब्रह्माचा निर्धारु । अंतरीं बाणे ॥ ५॥

श्री सद्‌गुरूच परमात्मवस्तूदाखवितात. सायससिवचार म्हणजे काय वगैरे सर्व कळून येते आणि परब्रह्माच्या स्वरूपासंबंधी निश्चय अंतःकरणात ठसतो. (५)

जे वस्तु दृष्टीस दिसेना । आणी मनास तेहि भासेना ।
संगत्यागेंविण ये ना । अनुभवासी ॥ ६॥

जी वस्तू डोळयांस दिसत नाही आणि मनानेही जी अनुमानता येत नाही, ती आत्मवस्तु संगाचा त्याग केल्याशिवाय अनुभवास येत नाही. (६)

अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागें अनुभव न दिसे ।
हें अनुभवी यासीच भासे । येरां गथागोवी ॥ ७॥

मी अनुभव घेतो, अशी वृत्ती जोपर्यंत असते, तोपर्यंत संगत्याग नसतो. ज्यावेळी संगत्याग घडतो तेव्हा अनुभव लक्षात येत नाही. द्वैत राहातच नाही. माझे हे बोलणे हे स्वानुभवीच जाणू शकतील इतरांना त्यात गोंधळ आहे असे वाटते. (७)

संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।
सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरूप ॥ ८॥

संगत्याग आणि आत्मनिवेदन, विदेहस्थिती आणि अलिप्तपणा, सहजस्थिती आणि उन्मनी म्हणजे मनातीतता, विज्ञान म्हणजेच स्वरूपानुभव ही सातही एकरूपच आहेत. (८)

याहिवेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें ।
सकळ कांहीं पादसेवनें । उमजों लागे ॥ ९॥

या स्थितीला आणखी नावेही आहेत. पण स्वरूपानुभवाचे समाधान व्यक्त करणारी ती खुणेची वचनेच असतात. हे सर्व काही केवळ श्री सद्‌गुरूंच्या चरणसेवनानेच समजू लागते. (९)

वेद वेदगर्भ वेदांत । सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत ।
अनुभव अनुर्वाच्य धादांत । सत्य वस्तु ॥ १०॥

वेद, वेदांचे रहस्य, वेदान्त, सिद्धांचा मार्ग, त्यातील रहस्य व त्यांचे सिद्धान्त यांचा अनुभव हा अवर्णनीय असला तरी तो सत्यवस्तू असल्याने प्रत्यक्षच असतो. (१०)

बहुधा अनुभवाचीं आंगें । सकळ कळती संतसंगें ।
चौथे भक्तीचे प्रसंगें । गोप्य तें प्रगटे ॥ ११॥

आत्मानुभवाची अशी अनेक अंगे आहेत. ती संतसंगाने संतसमागमात कळू लागतात. चौथ्या भक्तीचे वर्णन करण्याच्या प्रसंगाने परमार्थातील अनेक गुप्त रहस्ये ० होत आहेत. (११)

प्रगट वसोनि नसे । गोप्य असोनि भासे ।
भासाअभासाहून अनारिसे । गुरुगम्य मार्ग ॥ १२॥

परमात्यवस्तू प्रगट असूनही नसल्यासारखी वाटते व अदृश्य असूनही मनाला जाणवते. भास आणि अभासाच्या अतीत अशी ही परमात्मवस्तू गुरुगण्य मार्गानेच जाणता येते. (१२)

मार्ग होये परी अंतरिक्ष । जेथें सर्वहि पूर्वपक्ष ।
पाहों जातां अलक्ष । लक्षवेना ॥ १३॥

गुरुगण्य मार्ग हा आत्मारामाशी ऐक्य पावण्याचा मार्ग आहे. तेथे इतर तर्क इत्यादी पूर्वपक्षांप्रमाणे टिकू शकत नाहीत. कारण स्वस्वरूप मन, बुद्धी इंद्रियादींनी जाणता येण्यासारखे नाही. (१३)

लक्षें जयासी लक्षावें । ध्यानें जयासी ध्यावें ।
तें गे तेंचि आपण व्हावें । त्रिविधा प्रचिती ॥ १४॥

त्या वस्तूस लक्ष देऊन आतमध्ये पाहाण्याचा प्रयत्न करावा, ध्यान धरून त्यास जाणावयाचा प्रयत्न करावा. मग तसे करताना ती वस्तूच स्वतः आपणच होतो. शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती आणि आत्मप्रचीती ही त्रिविधा प्रचीती आहे. (१४)

असो हीं अनुभवाचीं द्वारें । कळती सारासारविचारें ।
सत्संगेंकरून सत्योत्तरें । प्रत्ययासि येतीं ॥ १५॥

असो. स्वस्वरूपानुभव प्रास करून घेण्याचे असे मार्ग आहेत. ते सागससिवचायने कव्यात व सत्संगाच्या योगे त्यांचा खरोखर अनुभव येतो. (१५)

सत्य पाहातां नाहीं असत्य । असत्य पाहातां नाहीं सत्य ।
सत्याअसत्याचें कृत्य । पाहाणारापासीं ॥ १६॥

परमात्मा सत्यस्वरूप आहे. त्याचा शोध घेऊ गेले की असत्याचा, मायिक वृष्टीचा लोप होतो. या उलट मायिक वृष्टीला खरे मानून त्यात गुरफटल्यावर सत्यस्वरूप परमात्मा दुरावतो. याप्रमाणे पाहणाऱ्यांच्या दृष्टीवर सत्य, असत्याची प्रचीती अवलंबून असते. (१६)

पाहाणार पाहाणें जया लागलें । तें तद्रूपत्वें प्राप्त जालें ।
तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७॥

पाहाणारा परमावर पाहाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो वेगळा उरतच नाही, तदूप होऊन जातो. असा तो जेव्हा तदूप होतो, तेव्हाच त्याच्या अंगी समाधान बाणते. (१७)

नाना समाधानें पाहातां । बाणती सद्गुवरु करितां ।
सद्गुसरुविण सर्वथा । सन्मार्ग नसे ॥ १८॥

समाधान अनेक प्रकारे होत असले तरी सद्‌गुरूंच्या कृपेनेच अंगी बाणते. त्यांच्याशिवाय परमात्यप्राक्षीचा दुसस मार्गच नाही. (१८)

प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेपें विद्याअभ्यास ।
अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९॥

नाना प्रयोग केले, ज्ञान, भक्ती, कर्मयोगादी अनेक साधने केली, निरनिराळ्या प्रकारे जप-तपादी सायास केले मोठ्या प्रयताने अनेकविद्यांचा अभ्यास केल, तरी गुरुकृपेमुळे जी प्राप्ती होते, ती दुसऱ्या कशानेही होऊ शकत नाही. (१९)

जें अभ्यासें अभ्यासितां न ये । जें साधनें असाध्य होये ।
तें हें सद्गुbरुविण काये । उमजों जाणे ॥ २०॥

जे अभ्यासाने प्रास होऊ शकत नाही, जे साधनांनी असाध्य आहे, त्याचे ज्ञान सद्‌गुरूशिवाय कसे काय होणार ? (२०)

याकारणें ज्ञानमार्ग- । कळाया, धरावा सत्संग ।
सत्संगेंविण प्रसंग । बोलोंचि नये ॥ २१॥

म्हणून ज्ञानमार्ग कळण्यासाठी सत्संग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सत्संगाखेरीज या गोष्टी बोलूसुद्धा नयेत. (२१)

सेवावे सद्गु रूचे चरण । या नांव पादसेवन ।
चौथे भक्तीचें लक्षण । तें हें निरोपिलें ॥ २२॥

सद्‌गुरूंच्या चरणांची सेवा याचेच नाव पादसेवन. याप्रमाणे चौथ्या भक्तीचे लक्षण येथे वर्णन केले आहे. (२२)

देव ब्राह्मण माहानुभाव । सत्पात्र भजनाचे ठाव ।
ऐसिये ठाईं सद्भााव । दृढ धरावा ॥ २३॥

देव, ब्राह्मण, आत्मज्ञानी संत व अत्यंत सात्त्विक सज्जन ही सेवेस योग्य स्थाने आहेत. त्यांच्या ठिकाणी दृढ सद्‌भाव धरावा. (२३)

हें प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें ।
परंतु सद्गुतरुपाय सेवणें । या नांव पादसेवन ॥ २४॥

हे जे मी सांगितले ते प्रवृत्तीचे बोलणे असून व्यवहार व परंपरा यांचे रक्षण व्हावे म्हणून सांगितले. परंतु वास्तविक सद्‌गुरु-चरणाची सेवा हीच खरी पादसेवन भक्ती होय. (२४)

पादसेवन चौथी भक्ती । पावन करितसे त्रिजगतीं ।
जयेकरितां सायोज्यमुक्ती । साधकास होये ॥ २५॥

ही पादसेवन नावाची चौथी भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी असून या भक्तीच्या योगेच साधकाला सायुज्यमुक्ती प्रास होते. (२५)

म्हणौनि थोराहून थोर । चौथे भक्तीचा निर्धार ।
जयेकरितां पैलपार । बहुत प्राणी पावती ॥ २६॥

म्हणून ही भक्ती श्रेष्ठांतही श्रेष्ठ आहे असे मी निर्धारपूर्वक सांगतो. तिच्या योगेच अनेक लोक या संसारसागराच्या पैलतीरास पोहोचले आहेत. (२६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पादसेवनभक्तिनिरूपणनाम समास चवथा ॥ ४॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘पादसेवनभक्तिनाम’ समास चौथा समाप्त.

समास पाचवा : अर्चनभक्ती

॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । चौथे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, मागल्या समासात चौथ्या भक्तीचे लक्षण वर्णन करून सांगितले. आता सावध होऊन पाचवी भक्ती कशी असते ते ऐका. (१)

पांचवी भक्ती तें आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन ।
शास्त्रोक्त पूजाविधान । केलें पाहिजे ॥ २॥

अर्चन ही पाचवी भक्ती असून अर्चन म्हणजे देवतार्चन करणे, पण ते शास्त्रोक्त विधीप्रमाणे यथासांग केले पाहिजे. (२)

नाना आसनें उपकर्णें । वस्त्रें आळंकार भूषणें ।
मानसपूजा मूर्तिध्यानें । या नांव पांचवी भक्ती ॥ ३॥

नाना प्रकारची आसने, पूजेची उपकरणी, वस्त्रे, अलंकार- भूषणे यांनी पूजा करावी. मनात मूर्तीचे ध्यान करावे आणि तिची मानसपूजा करावी. ही पाचवी भक्ती आहे. (३)

देवब्राह्मणाग्नीपूजन । साधुसंतातीतपूजन ।
इति महानुभाव गाइत्रीपूजन । या नांव पांचवी भक्ती ॥ ४॥

देव, ब्राह्मण, अग्नी, साधु-संत, अतिथिअभ्यागत यांचे पूजन तसेच यती, ब्रह्मज्ञानी, संत, गाय, यांचे पूजन ही पण पाचवी भक्ती जाणावी. (४)

धातुपाषाणमृत्तिकापूजन । चित्र लेप सत्पात्रपूजन ।
आपले गृहींचें देवतार्चन । या नांव पांचवी भक्ती ॥ ५॥

धातू मृत्तिका, पाषाण यांच्या मूर्ती तसेच तसबिरी व गंधाच्या लेपाने भिंतीवर काढलेल्या उपासनामूर्ती किंवा संत यांची पूजा करावी. तसेच आपल्या घरातील देवाचीही पूजा करावी. याला पाचवी भक्ती म्हणतात. (५)

सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित ।
लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ॥ ६॥

सात किंवा नऊ शुभचिहे असलेले दगड शाळिग्राम, चक्रांकित दगडाचे तुकडे, शिवलिंगे, सूर्यकांत, चंद्रकांत मणी, शंकराचे बाण, तांदळे व नर्मदेतील गोटे (६)

भैरव भगवती मल्लारी । मुंज्या नृसिंह बनशंकरी ।
नाग नाणी नानापरी । पंचायेत्नपूजा ॥ ७॥

तसेच भैरव, भगवती (देवी), मल्हारी, मुंज्या, नृसिंह, बनशंकरी, नाग, निरनिराळ्या प्रकारची देवतांचा छाप असलेली नाणी, पंचायतनाची म्हणजे गणेश, सूर्य, शक्ती, शिव व विष्णू या मुख्य पाच देवतांची पूजा, ही अर्चनभक्ती होय. (७)

गणेशशारदाविठलमूर्ती । रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती ।
श्रीरंगहनुमंतगरुडमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८॥

गणेश, शारदा, विठ्ठल यांच्या मूर्ती, तसेच रंगनाथ, जगनाथ, नटराज यांच्या मूर्ती, श्रीरंग, हनुमंत, गरुड यांच्या मूर्तीचे पूजन करावे. (८)

मत्छकूर्मवर्ह्हावमूर्ती । नृसिंहवामनभार्गवमूर्ती ।
रामकृष्णहयग्रीवमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ९॥

मक्य, कूर्म, वयह, नृसिंह, वामन, भार्गव यांच्या मूर्ती, राम, कृष्ण, हयग्रीव यांच्या मूर्तीचीही पूजा करावी. (९)

केशवनारायणमाधवमूर्ती । गोविंदविष्णुमदसूदनमूर्ती ।
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती । रुषीकेश पद्मनाभि ॥ १०॥

केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर हृषीकेश, पद्यनाभ, (१०)

दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती । प्रद्युम्नानुरधपुरुषोत्तममूर्ती ।
अधोक्षजनारसिंहाच्युतमूर्ती । जनार्दन आणी उपेंद्र ॥ ११॥

दामोदर संकर्षण, वासुदेव, प्रद्युस्त, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन व उपेंद्र यांच्या मूर्ती, (११)

हरिहरांच्या अनंत मूर्ती । भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती ।
शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२॥

तसेच हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत, जगदात्मा, जगदीश यांच्या मूर्ती आणि शिवशक्तीच्या बहुविध मूर्ती देवतार्चनी पूजाच्या. (१२)

अश्वत्थनारायेण सूर्यनारायेण । लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण ।
श्रीहरीनारायण आदिनारायण । शेषशाई परमात्मा ॥ १३॥
ऐश्या परमेश्वराच्या मूर्ती । पाहों जातां उदंड असती ।
त्यांचें आर्चन करावें, भक्ती- । पांचवी ऐसी ॥ १४॥

अश्वत्यनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनाशयण, त्रिमल्लनारायण, श्रीहरिनासयण, आदिनारायण, शेषशायी, परमात्मा अशा परमेश्वराच्या मूर्ती दिसून येतात. त्यांचे अर्चन करणे ही पाचवी भक्तीच आहे. (१३ – १४)

याहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये अनुक्रम ।
उत्तम अथवा मध्यम । करीत जावें ॥ १५॥

याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म जसे चालत आले असतील त्यांचे त्याप्रमाणेच पालन कमवे. त्यांचा अनुक्रम सोडू नये. उत्तम अथवा मध्यम कसेही असोत आपण ते करीत जावे. (१५)

जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी ।
पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६॥

जाखमाता, मायसणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी यांची पूजा कुलधर्माप्रमाणे करावी. (१६)

नाना तीर्थांक्षत्रांस जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें ।
नाना उपचारीं आर्चावें । परमेश्वरासी ॥ १७॥

नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जावे, तेथे त्या त्या देवतेचे पूजन करावे. नाना प्रकारच्या उपचारांनी परमेश्वराची अर्चना करावी. (१७)

पंचामृतें गंधाक्षतें । पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें ।
धूपदीप असंख्यातें । नीरांजनें कर्पुराचीं ॥ १८॥
नाना खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबोलप्रकार ।
दक्षणा नाना आळंकार । दिव्यांबरें वनमाळा ॥ १९॥
सिबिका छत्रें सुखासनें । माहि मेघडंब्रें सूर्यापानें ।
दिंड्या पताका निशाणें । टाळ घोळ मृदांग ॥ २०॥
नाना वाद्यें नाना उत्साव । नाना भक्तसमुदाव ।
गाती हरिदास सद्भाव- । लागला भगवंतीं ॥ २१॥

पंचामृते, गंधाक्षता, नाना प्रकारची फुले सुवासिक द्रव्ये, अनेक प्रकारचे धूप-दीप, असंख्य नीरांजने, कर्पूरार्ती, नाना खाद्ये, सुंदर नैवेद्य, नाना प्रकारची फळे व विड्याचे नाना प्रकार दक्षिणा, नाना अलंकार दिव्य अशी वस्त्रे, वनमाला, पालख्या, छत्रे, सुखासने, पाल्यीवर धरतात त्या उंच छत्र्या, अब्दागिरी, दिंड्या, पताका, निशाणे, जळ, घोळ, मृदुंग, अनेक प्रकारची वाद्ये देवाला अर्पण करावी. अनेक प्रकारचे उत्सव, त्यात एकत्रित होणारे भक्तांचे समुदाय आणि हरिदास, भगवंताचे गुणानुवाद भगवंतांच्या भक्तीत रंगून गाऊ लागतात. त्यामुळे आनंद उचंबळून येतो. (१८ – २१)

वापी कूप सरोवरें । नाना देवाळयें सिखरें ।
राजांगणें मनोहरें । वृंदावनें भुयरीं ॥ २२॥

पाण्याचे आठ विहिरी, सरोवरे नाना देवालये, त्यांची शिखरे मोठी अंगणे, सुंदर वृंदावने व तळघरे (२२)

मठ मंड्या धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।
नाना उपकर्णें नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामुग्री ॥ २३॥

मठ मोठमोठ्या माड्या, अथवा यात्रेच्या वेळी बाजारहाट मांडण्यासाठी केलेल्या मंडई, धर्मशाळा, तसेच देवद्वारी ओवऱ्या, नाना उपकरणी, नक्षत्रमाला, नाना वस्त्रे वगैरे सामग्री, (२३)

नाना पडदे मंडप चांदोवे । नाना रत्नघोष लोंबती बरवे ।
नाना देवाळईं समर्पावे । हस्थि घोडे शक्कटें ॥ २४॥

अनेक पडदे, चांदवे, मंडप, लोंबणारे मोत्यांचे रत्नांचे घोस, तसेच हत्ती, घोडे, रथ, गाड्या निरनिराळ्या देवालयांना अर्पण करावेत. (२४)

आळंकार आणि आळंकारपात्रें । द्रव्य आणी द्रव्यपात्रें ।
अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें । नाना प्रकारीचीं ॥ २५॥

अलंकार आणि ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य आणि ते ठेवण्याच्या पेट्या, अनोदक आणि त्यासाठी लागणारी ताटे, वाड्या, भांडी, पातेली, हंडे, कळशा वगैरे अनेक प्रकारची भांडी, देवाला अर्पण करावीत. (२५)

वनें उपवनें पुष्पवाटिका । तापस्यांच्या पर्णकुटिका ।
ऐसी पूजा जगन्नायका । येथासांग समर्पावी ॥ २६॥

वने-उपवने, पुष्पवाटिका, ल्लागा, फळबागा, तपस्वी लोकांना राहण्यासाठी झोपड्या असे सर्व समर्पण भावाने जगनायकाला यथासांग अर्पण करून याप्रकारे त्याची पूजा करावी. (२६)

शुक शारिका मयोरें । बदकें चक्रवाकें चकोरें ।
कोकिळा चितळें सामरें । देवाळईं समर्पावीं ॥ २७॥

पोपट सारिका, मोर बदके, चक्रवाक चकोर कोकिळा वगैरे पक्षी आणि चितळ सांबर याप्रकारची हरणे देवालयाला अर्पण करावी. (२७)

सुगंधमृगें आणी मार्जरें । गाई म्हैसी वृषभ वानरें ।
नाना पदार्थ आणी लेंकुरें । देवाळईं समर्पावीं ॥ २८॥

त्याचप्रमाणे कस्तुरीमृग, मांजरे, गाई, म्हशी, बैल, वानरे ही जनावरे आणि इतर नाना पदार्थ आणि लेकरे देवालयाला अर्पण करावीत. (२८)

काया वाचा आणी मनें । चित्तें वित्तें जीवें प्राणें ।
सद्भाaवें भगवंत आर्चनें । या नांव आर्चनभक्ती ॥ २९॥

काया, वाचा, मन, चित्त, वित्त म्हणजे पैसा अडका, जीव व प्राण थोडक्यात म्हणजे आपले सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण करून अंतःकरणापासून त्याची पूजा करणे, याचे नाव अर्चनभक्ती आहे. (२९)

ऐसेंचि सद्गुभरूचें भजन- । करून, असावें अनन्य ।
या नांव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३०॥

अशाच प्रकारे श्री सद्‌गुरूची पूजा करून त्यांना अनन्यभावाने शरण जाणे, याचेही नाव भगवद्‌भजन असून तीही पाचवी भक्तीच आहे. (३०)

ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी ।
मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ॥ ३१॥

अशा रीतीने बाह्योपचारांनी चांगली पूजा घडू शकली नाही तरी मानसपूजा तरी अगत्य करावी. (३१)

मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें ।
मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२॥

मनाने भगवंताचे पूजन करावे. मनाने कलून विविध उपचार आदी सर्व काही त्यास प्रेमाने अर्पण करावे. मानसपूजेचे लक्षण हे असे आहे. (३२)

जें जें आपणांस पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे ।
येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ॥ ३३॥

आपल्याला देवाला जे जे अर्पण करावे अशी इच्छा असले, ते ते सर्व मनाने कलून त्यांच्या चरणी अर्पण करावे. या प्रकारे मानसपूजा अवश्य करावी. (३३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
र्चनभक्तिनाम समास पंचवा ॥ ५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘अर्चनभक्तिनाम’ समास पाचवा समाप्त.

 

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a5%a5-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a5%a5/feed/ 0
श्रीसद्‍गुरुलीलामृत https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4/#respond Wed, 31 Jan 2024 06:58:58 +0000 https://www.sadguruvani.in/?p=1060

श्रीसद्‍गुरुलीलामृत

अध्याय पहिला
समास पहिला

महारुद्र जे मारुती रामदास । कलीमाजिं ते जाहले रामदास ॥
जनां उद्धराया पुन्हां प्राप्त होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १ ॥

जयजयाजी एकदंता । विघ्नांतका सिद्धिदाता ।
नमन करूं तुज आतां । ग्रंथ सिद्धीतें पाववीं ॥ १ ॥
सकल गणांचा अधिपति । म्हणूनि नामें गणपति ।
तव प्रसादें मंदमति । वाचस्पति होय ॥ २ ॥
सकल मंगलामाजीं एक । प्रथम पूजावा विनायक ।
श्रुतिस्मृति बोलती कौतुक । निर्विघ्न करी कार्यसिद्धि ॥ ३ ॥
पाशांकुश वरदहस्त । एके करीं मोदक शोभत ।
मूषकावरी अति प्रीत । सर्वांगीं सिंदूर चर्चिला ॥ ४ ॥
तुझिये कृपाकटाक्षें । अलक्ष्य वस्तु तेही लक्षे ।
अज्ञानी पाविजे कक्षे । सिद्धाचिया ॥ ५ ॥
असतां सुवर्ण हातीं । कांही कार्यें साध्य होती ।
तुझी कृपा जे संपादिती । तयांसी सकल सिद्धि ॥ ६ ॥
चौदा विद्या चौसष्ट कला । ह्या तंव तुझिया सहजलीला ।
पदीं नमवी शिरकमला । तया प्राप्ति सहजचि ॥ ७ ॥
आदिमाया आणि ईश्वर । तयांचा अंकुर सुंदर ।
रूप तरी लंबोदर । अनंत ब्रह्मांडे सांठवी ॥ ८ ॥
सिंदुरासुर मातला । त्रैलोक्या अजिंक्य जाहला ।
ब्रह्मादिकीं तुज स्तविला । नानास्तोत्रीं ॥ ९ ॥
मर्दोनिया तो असुर । भक्तचिंता केली दूर ।
शिवलिंग रावण वीर । नेऊं पाहे स्वस्थानीं ॥ १० ॥
त्वां बालरूप घेऊन । घेतलें तें हिरावून ।
मृत्युलोकीं स्थापून । गोकर्ण क्षेत्र निर्मिलें ॥ ११ ॥
आतां हीच विनंति । दीनासी धरूनि हातीं ।
ग्रंथसिद्धीची आयती । पुरवावी तुवां ॥ १२ ॥
जयजय श्रीशारदामाय । सप्रेम वंदोनि तव पाय ।
तुज तुझें शब्दप्रमेय । समर्पूं आतां ॥ १३ ॥
ॐकाराची जननी । ब्रह्मांडाची मुळापासोनी ।
घडामोडी स्वेच्छेंकरोनी । क्षणामाजीं करितसे ॥ १४ ॥
परेहूनि जी पर । तुर्यास्वरूप निरंतर ।
न कळे जियेचा पार । अगाध लीला ॥ १५ ॥
जिचे गायनाचा विलास । मधुरध्वनि नवरस ।
भुलवी नादें जनांस । जगद्वंद्य ॥ १६ ॥
काश्मीरदेशीं अधिष्ठान । सुंदर मयूर वाहन ।
परेसी जिचेनि स्फुरण । विद्यादेवी ॥ १७ ॥
सुंदरांमाजीं सुंदर । चतुरांमाजीं चतुर ।
भक्तांलागीं अभयकर । ज्ञानजोति ॥ १८ ॥
शुद्ध द्वितीयेचा चंद्रमा । पहावया पल्लवसीमा ।
करोनि दाविती व्योमा । जन जैसें ॥ १९ ॥
तैसें पहावया निजस्थान । शब्द ब्रह्मसीमा जाण ।
ज्ञानेंकरोनि विज्ञान । दाविती सिद्ध ॥ २० ॥
धनावरी असे बैसला । परि नेणिवेनें वायां गेला ।
तैसें तव स्वरूपाला । न जाणता व्यर्थ ॥ २१ ॥
जाणीव नेणीव क्रिया दोनी । चिच्छक्ति चारी वाणी ।
दशेंद्रियां चाळवणी । तुझेनि योगें ॥ २२ ॥
मीपणाची जी स्फूर्ति । ती ही तुझीच शक्ति ।
शक्ति करितां मति । कुंठित होय ॥ २३ ॥
परि आम्हां भाविकांसी । सगुणोपासना निश्चयेंसी ।
म्हणूनि तव चरणांसी । वंदूं आतां ॥ २४ ॥
ग्रंथलेखनाची स्फूर्ति । उपजविली जैशी चित्तीं ।
सांग करीं समाप्ति । चिंता मजसी कासया ॥ २५ ॥
आतां वंदूं सद्‍गुरुमाय । जें देवांचेंही आदिध्येय ।
सद्भावें वंदितां पाय । द्वैतभाव मावळे ॥ २६ ॥
जयाचें करितां स्तवन । ज्ञानियां पडे मौन ।
मी अज्ञानी मतिहीन । विनवावें कवणेपरी ॥ २७ ॥
जयाचें जाणतां स्वरूप । जाणता होय तद्रूप ।
ध्येय ध्याता ध्यान अल्प । वेगळें उरेना ॥ २८ ॥
तुमची करूं जातां स्तुति । न पुरे शब्द-व्युत्पत्ति ।
परि आवडी उठली चित्ती । मानूनि घ्यावी ॥२९ ॥
जैसी लेकुरें मातेप्रती । लटिकेंचि जेवूं घालिती ।
उदर न भरे परि तृप्ती । माय दावी ॥ ३० ॥
तैसा निर्विकल्प अरूप । भक्तांकारणें धरिलें रूप ।
म्हणूनि स्तवनाचा संकल्प । कौतुक पुरवी ॥ ३१ ॥
वत्स देखोनि पान्हा घाली । तैशी सद्‍गुरु माउली ।
सच्छिष्यांतें पावली । ज्ञानबोधें ॥ ३२ ॥
यास्तव श्रीगुरु आधार । साधक पावे पैलपार ।
दुजें तारूं नसे थोर । भवसिंधु तरावया ॥ ३३ ॥
गुरुवांचोनि तरला । ऐसा देखिला ना ऐकिला ।
महिमा न वचे वर्णिला । निरुपमेय ॥ ३४ ॥
गुरु तोचि सदाशिव । गुरु तोचि ब्रह्मदेव ।
गुरु नारायण स्वयमेव । चिद्वस्तु ॥ ३५ ॥
गुरूचे घरीं पाणी भरी । अथवा सडासंमार्जन करी ।
ऋद्धिसिद्धि तयाचे द्वारीं । सदा तिष्ठती ॥ ३६ ॥
गुरुकृपेचा महिमा । बोलावया नाहीं सीमा ।
अनुभवी अनुभवे आरामा । धन्य साधु ॥ ३७ ॥
परत्यक्त दुरितें मळती । तीं तीर्थें पुनीत व्हाया येती ।
गुरुसेवापरायण असती । तयांपाशी ॥ ३८ ॥
न करितां वेदाध्ययन । षट्शास्त्रादि पठण ।
सद्भावें सद्‍गुरुचरण । सेवितां ज्ञान होय ॥ ३९ ॥
गुरुक्षेत्र काशीपुरी । अथवा जाणावी पंढरी ।
देवांचा देव वास करी । काय वानूं ॥ ४० ॥
सद्गुरूचें चरणतीर्थ । सकल तीर्थांहूनि पुनीत ।
स्नानापान घडतां नित्य । अनंत पातकी उद्धरती ॥ ४१ ॥
सद्गुरूचे सन्निध वास । तोचि केवळ ब्रह्मरस ।
आर्त पीडित जनांस । धन्य तारूं ॥ ४२ ॥
सच्छिष्य उत्तम क्षेत्र । अनुतापें खणिलें पवित्र ।
भक्तिरस भरोनि पात्र । सिंचिलें तयावरी ॥ ४३ ॥
गुरुवाक्य निर्मळ बीज । पेरिते झाले सहज ।
अंकुराचें पाहती चोज । कूर्मदृष्टीं ॥ ४४ ॥
ऐसा तूं सद्‍गुरुराणा । वर्णूं न शकेंचि निर्गुणा ।
गुरुभक्तीच्या खुणा । गुरुभक्त जाणती ॥ ४५ ॥
कल्पतरू म्हणों जातां । न पाही तो अहिता-हिता ।
इच्छिलें पुरवी तत्त्वतां । आन नेणे ॥ ४६ ॥
तैशी नव्हे गुरुमूर्ति । हित अनहित पाहती ।
हितकर वस्तूच हातीं । देती साधकांच्या ॥ ४७ ॥
जरी म्हणावें परीस । देई केवळ सुवर्णास ।
सद्‍गुरु स्वस्वरूपास । देत असे ॥ ४८ ॥सुवर्ण तें नाशवंत । स्वरूप जाणावें शाश्वत ।
अशाश्वत शाश्वतासी एकमत । होईल कैसें ॥ ४९ ॥
परिस न देई आपुलेपण । लोहासि करी सुवर्ण ।
परि सुवर्णाअंगीं परिसपण । येत नसे ॥ ५० ॥
तैसा नव्हे कीं गुरुवर । शिष्या दे स्वाधिकार ।
तयाकरवीं असंख्य नर । तारितसे ॥ ५१ ॥
कामधेनू म्हणों जातां । काममूळ जी अहंता ।
खणोनि काढी तत्त्वतां । काय मागावें ॥ ५२ ॥
गुरूसि म्हणावें मातापिता । तरी न होय साम्यता ।
मातापित्यांची ममता । एकदेशी ॥ ५३ ॥
बालक सुखी असावें । ऐसें इच्छिती मनोभावें ।
केवळ इहलोक साधावें । म्हणोनि एकदेशी ॥ ५४ ॥
परत्रसुखातें नेणती । जाणतां द्यावया नसे शक्ति ।
मायामोहें गुंते वृत्ति । बहुतेकांची ॥ ५५ ॥
तैशी नव्हे तुमची लीला । इहपर स्वानंदसोहळा ।
भोगवितां शिष्यबाळा । जीवन्मुक्ती ॥ ५६ ॥
मुक्या मुखें बोलविसी । लुल्या करवी काम घेसी ।
पांगुळ्यासही चालविसी । सहजचि ॥ ५७ ॥
अंधासि देसी लोचन । भवरोगासी भेषज जाण ।
मुमुक्षुचातका जीवन । मुक्तिरस वर्षतसे ॥ ५८ ॥
तूं वैराग्याचें मंदिर । शांतिसुखाचें माहेर ।
शमदमादि वळण सुंदर । तुझिये ठायीं ॥ ५९ ॥
साधनचतुष्टयाची वाट । भक्तिज्ञानाची पेठ ।
मोल शुद्धभाव श्रेष्ठ । असे येथींचा ॥ ६० ॥
ऐसा सद्‍गुरुराव । चरणीं राहो शुद्ध भाव ।
हृदयस्थ स्वयमेव । बोलवीं बोल ॥ ६१ ॥
तुझे कृपाप्रसादें चित्तीं । चरित्र वदविण्याची स्फूर्ति ।
कृपाकटाक्षें करीं तृप्ति । बाळलीला ॥ ६२ ॥
सद्गुरूची थोर करणी । नवचे वदली वाणी ।
मी तंव असें अज्ञानी । केवीं बोलूं ॥ ६३ ॥
माउली सन्निध असतां । तीस बालकाची चिंता ।
क्रीडेमाजीं पडतां । वेळोवेळां सांवरी ॥ ६४ ॥
गुरुमाउलीचेनि बळे । बोलूं बोल हे आगळे ।
भक्तिरसाचे सोहळे । पुरवूं आजीं ।।६५॥
चरित्रांमाजीं चरित्र । संतचरित्र परम पवित्र ।
श्रवणें पाविजे परत्र । सार्थकता ॥ ६६ ॥
संतचरित्राचा कित्ता । सतत पुढें ठेवितां ।
मोक्ष येईल हातां । साधकांच्या ॥ ६७ ॥
ऐसे हे संतजन । वर्षती स्वानंदजीवन ।
तयांसि करूं नमन । साष्टांग भावें ॥ ६८ ॥
तयांचा वाग्विलास । नवविधा भक्तिरस ।
सेवूनि पावती तृप्तीस । भाविक जन ॥ ६९ ॥
साधकासी आदर्शभूत । न्यून पूर्ण प्रत्ययें दावित ।
आपणामाजीं मेळवित । परोपकारी ॥ ७० ॥
जयांचें घडतां दर्शन । चित्त होय उदासीन ।
ना तरी उत्तम नरदेह पावून । व्यर्थ आयुष्य दवडिलें ॥ ७१ ॥
यांचे चालीनें चालावें । यांचे बोलीनें बोलावें ।
यांच्या सन्निध असावें । सर्वकाळ ॥ ७२ ॥
यांची स्थिती अनुभवावी । तरीच देहसार्थकता बरवी ।
आतां हानि न करावी । आयुष्याची ॥ ७३ ॥
ऐशी उपरति होय मना । क्षणएक घडतां दर्शना ।
विषयांपासोन वासना । फिरे मागें ॥ ७४ ॥
मग होय समाधान । आनंदाश्रूंनी लोचन ।
भरती, रोमांच परिपूर्ण । सर्वांगीं थरारती ॥ ७५ ॥
कंठ होय सद्गदित । भक्तिप्रेमें उचंबळत ।
मुखीं हरिनाम रसभरित । नाचतसे आनंदें ॥ ७६ ॥
कन्येस माहेर मूळ । येतां आनंदकल्लोळ ।
तैसा संतभेटीचा काळ । आनंदा आनंदवी ॥ ७७ ॥
कीं ह्या परमार्थमार्गींच्या ज्योती । लखलखीत तेजोमय दीप्ति ।
वळसे खळगे दाविती । ज्ञानोदयापर्यंत ॥ ७८ ॥
ऐसी संतकृपा राणीव । भूतीं भगवंत ही जाणीव ।
सुष्ट-दुष्ट एकभाव । प्रेमपान्हा पाजविती ॥ ७९ ॥
संतामाजीं वरिष्ठ । तिहीं अध्यात्मग्रंथ केले स्पष्ट ।
भवसिंधूवरूनि वाट । करणी जयांची ॥ ८० ॥
प्राचीन अर्वाचीन दोन्ही । भूतभविष्यवर्तमानीं ।
उपयुक्त ज्यांची करणीं । वंदूं तया ॥ ८१ ॥
आतां नमूं कुलदैवता । विष्णुपंचायतना समस्ता ।
हरिहर गणेश सविता । जगन्माता जगदंबा ॥ ८२ ॥
वेळोवेळीं रक्षिलें । हातीं धरोनि सांभाळिलें ।
नित्य पाहिजेत स्मरण केले । उपकार ज्यांचे ॥ ८३ ॥
गोत्र दैवत अत्रिऋषि । भार्या पतिव्रता जयासी ।
लाधली, दत्तरूपें कुशी । ब्रह्माहरिहर अवतरले ॥ ८४ ॥
जे सकळांचे गुरुवर । केला बहुत जगदुद्धार ।
करिती, पुढें करणार । नमन असो तयांसी ॥ ८५ ॥
तया कृपेचेनि योगें । सद्‍गुरुभेटीं होय वेगें ।
नाहींतरी फिरतां भागे । न मिळे मोक्षदाता ॥ ८६ ॥
वंदूं माता आणि पिता । जयांची देहावरी सत्ता ।
देहयोगें कर्तव्यता । घडे सर्व ॥ ८७ ॥
माउलीचा उपकार भला । नवमास भार वाहिला ।
सेवेचा योग नाहीं घडला । बाळपणीं निवर्तली ॥ ८८ ॥
दिधली असे कामधेनू । मिळवावया नारायणु ।
तया उपकारातें वानूं । कोण्या मुखें ॥ ८९ ॥
परदेशी पाळिला पोर । निःस्वार्थ केला थोर ।
तिये वंदितां नीर । नयनीं लोटे ॥ ९० ॥
कुलदैवत गोत्रदैवत । जननी जनक पाळितें दैवत ।
इतुक्यांचा ऋणाइत । देह थोर वाढविला ॥ ९१ ॥
याचें सार्थक करितां कांही । तरीच ऋण फिटेल लवलाही ।
नाहीं तरी भवडोहीं । बुडावें लागे ॥ ९२ ॥
असो आतां श्रोतेजन । श्रवणीं बैसले सज्जन ।
तयांचे वंदोनि चरण । ग्रंथारंभ करितसें ॥ ९३ ॥
श्रवणीं बैसलें सादर । न्यूनाधिकीं ना अनादर ।
जाणोनि अजाणत्याचें कीर । पुरविती जे ॥ ९४ ॥
जैसा नाट्यलेखक । नटबोल ऐके सकौतुक ।
तैसे लिहविले लेख । श्रवण कीजे ॥ ९५ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय पहिला
समास दुसरा

करावें सावध चित्त । तरी कळे येथील मात ।
गुरुलीला अगम्य अद्‍भुत । जड देहा न कळेचि ॥ १ ॥
ब्रह्मीं अष्टधा प्रकृति । तिचे कर्दमें ब्रह्मांड उत्पत्ति ।
ती मूळ माया निश्चितीं । जाणावी तुवां ॥ २ ॥
प्रकृति जड अचेतन । पुरुषसंयोगें सचेतन ।
पुरुष म्हणजे जाणीव ज्ञान । प्रकृतीमध्यें बिंबलें ॥ ३ ॥
ऐसा संसार वाढला । उत्पत्ति-स्थिति-प्रळयला ।
शास्ता त्रिगुणरूपें झाला । परमात्मा जो ॥ ४ ॥
ब्रह्मा करी उत्पन्न । विष्णु प्रतिपाळी जाण ।
रुद्र संहारी आपण । कार्यभाग चालिला ॥ ५ ॥
चौऱ्यांशी लक्ष जीवयोनि । उभारिले लोक तिन्ही ।
जाणीव दिधली वांटोनी । सकलां ठायीं ॥ ६ ॥
विशेष जाणिवेचें स्थान । तो हा नरदेह जाण ।
येथींचे उत्तम जन । पावती मूळरूपा ॥ ७ ॥
अखंड प्रकृतीचेनि संगें । जाणीवही भंगों लागे ।
जाणिवेसी करावया जागे । सिद्ध पुरुष ॥ ८ ।
जाणीव स्थिर रहावया । वेदें ज्या दाविल्या क्रिया ।
आचरितां मार्गें तया । विमल ज्ञान होतसे ॥ ९ ॥
हरिहर अवतरती । अथवा अंशरूपें अवतार घेती ।
जाणीवेसी जागविती । वेळोवेळां ॥ १० ॥
तैसे माझे सद्‍गुरुराव । हनुमदंश स्वयमेव ।
जगदुद्धाराचें लाघव । करूनि दाविती ॥ ११ ॥
एकादश रुद्र हनुमंत । सदाशिव अंश निश्चित ।
वेळोवेळां स्थापित । भक्ति ज्ञान उपासना ॥ १२ ॥
ऐसे अवतार किती होती । कोणा न करवे गणती ।
कथानुरोधें उपपत्ति । करूं कांहीं ॥ १३ ॥
त्रेतायुगीं अवनीवरी । दैत्य मातले अहंकारी ।
विपरीतज्ञानें अघोरी । क्रिया करूं लागले ॥ १४ ॥
वर्णाश्रमातें बुडविती । यज्ञसाधनें तुडविती ।
दीन अनाथां रडविती । छळछळोनी ॥ १५ ॥
गाई ब्राह्मण स्त्रियादिकां । छळिती भ्रष्टविती जे कां ।
आचरिती नित्य पातकां । दुष्टबुद्धी ॥ १६ ॥
कृषिकर्में मंदावलीं । यज्ञकृत्यें थांबलीं ।
रणें माजों लागलीं । नानाप्रकारें ॥ १७ ॥
भूलोकीं केली पीडा । देवलोकांचा चुराडा ।
मदमत्सर वाढला गाढा । देव बंदी घातले ॥ १८ ॥
रावणकुंभकर्णादि वीर । वरप्रदानें मातले फार ।
कोणासही सुविचार । सुचों न देती ॥ १९ ॥
लेकुरें दुःखी देखोनि भारी । धरित्री होय घाबरी ।
गोरूपें सत्यलोकामाझारीं । मुनिगणांसह पातली ॥ २० ॥
करिती बहु स्तुतिस्तोत्रा । विनविती ते चतुर्वक्त्रा ।
झांकोनि बैसला नेत्रां । ऐसी करुणा भाकिती ॥ २१ ॥
“सत्क्रिया राहिली । असत्क्रिया बळावली ।
सैराटवृत्ती चालिली । शास्ता नाहीं ॥ २२ ॥
अज्ञान हें पैसावलें । विपरीतज्ञानें वेडें केलें ।
पाप अत्यंत वाढलें । तमोबुद्धी ॥ २३ ॥
दुष्कर्में करिती गहन । सात्त्विकांचे करिती हनन ।
आतां होईना सहन । अति दुःख होतसे ॥ २४ ॥
याचा करावा विचार । भक्तांसि द्यावा आधार ।
मर्दोनि ते असुर । जग सुस्थिर करावें” ॥ २५ ॥
ब्रह्मा विचारीं मानसीं । वरप्रसादें रावणासी ।
वैभव बल अतिशयेंसी । चढले असे ॥ २६ ॥
याचा प्रतिकार करावया । विनवूं अच्युता लवलाह्यां ।
क्षीराब्धिनिकटीं जाऊंनिया । प्रार्थूनिया करुणस्वरें ॥ २७ ॥
ऐसे वदोनि सत्वरीं । सकलांसमवेत क्षीरसागरीं ।
पातले ते अवसरीं । प्रेमभरें गर्जती ॥ २८ ॥
जयजय माधवा मधुसूदना । केशवा गोविंदा नारायणा ।
महाविष्णु मुरमर्दना । कमलनयना रमापते ॥ २९ ॥
श्रीवत्सकौस्तुभधारी । शेषशायी अघहारी ।
विश्वव्यापका श्रीहरी । जगन्नाथा जनार्दना ॥ ३० ॥
भक्तकाजकल्पद्रुमा । भक्ताधीन आत्मारामा ।
भक्तहृदयीं पुरुषोत्तमा । वास तुझा ॥ ३१ ॥
गरुडवाहना गरुडध्वजा । असुरांतका अधोक्षजा ।
पंचानन तूं भवगजा । विदारक ॥ ३२ ॥
लक्ष्मी तव चरणांची दासी । नारदतुंबर सुस्वरेंसी ।
गायन करिती अतिहर्षीं । सदोदित ॥ ३३ ॥
कंठीं शोभे वैजयंती । सहस्ररश्मीपरी दीप्ती ।
नीलवर्ण सुंदर कांती । सदा शांती नांदतसे ॥ ३४ ॥
पहोनिया खिन्न वदन । बोलतसे जगज्जीवन ।
कवण काजा आगमन । सांगावें सविस्तर ॥ ३५ ॥
कमलोद्भव बोले वचन । त्रैलोक्या गांजितसे रावण ।
पराभवोनि देवगण । बंदीमाजीं टाकिले ॥ ३६ ॥
अभय देत वैकुंठासी । भविष्य जाणोनि मानसीं ।
सूर्यवंशीं दशरथकुशीं । घेऊं लीला अवतार ॥ ३७ ॥
नामाभिधान श्रीराम । सकलां होईल आराम ।
देव पावतील स्वधाम । चिंता कांहीं न करावी ॥ ३८ ॥
सकल देवीं आपुलिया अंशें । भूमंडळीं कपिवेषें ।
साह्यार्थ मजसरिसें । अवतारावें ॥ ३९ ॥
आज्ञा वंदोनि शिरीं । हर्षभरित होती अंतरीं ।
निघाले देव सत्वरीं । स्वस्थाना पातले ॥ ४० ॥

तेव्हां किष्किंधा नगरींत । देव पातले समस्त ।
महारुद्र हनुमंत । अंजनीउदरीं राहिले ॥ ४१ ॥
जन्मतांचि बुभुःकार । नादें दुमदुमिलें अंबर ।
गिळावयासी भास्कर । उडी घेतली ॥ ४२ ॥
झुंजतां तेथें राहूसवें । हनुमंत ऐसें नाम पावे ।
बळें आगळा स्वभावें । बलभीम जो ॥ ४३ ॥
पुच्छें घाली ब्रह्मांडा वेढा । पर्वत उचली धडाडा ।
राक्षसांचा चुराडा । क्षणामाजीं करितसे ॥ ४४ ॥
रावणवधार्थ रघुनंदन । अयोध्येहूनि निघोन ।
मारोनियां खरदूषण । ऋष्यमुकीं पावले ॥ ४५ ॥
तंव तेथें अकस्मात । भेटते झाले वायुसुत ।
चरणीं लोटांगण घालित । दास्यत्वासी आदरिलें ॥ ४६ ॥
रामसेवेवांचूनि कांहीं । दुजी आवड जया नाहीं ।
ऐसा मारुती वज्रदेही । रामनामें गर्जतसे ॥ ४७ ॥
शतयोजन जलनिधी । उल्लंघोनि, राक्षसमांदी ।
असंख्य वधोनि दुष्टबुद्धी । सीताशुद्धी केलीसे । ४८ ॥
रामकार्या अति तत्पर । रामभजनी अति सादर ।
भक्तांमाजीं अग्रेसर । वैषववीर म्हणवीतसे ॥ ४९ ॥
समूळ राक्षसां वधोनी । वनवासव्रत सारोनी ।
राम बैसले सिंहासनीं । जयजयकारें ॥ ५० ॥
याचकां दिधली दानें । भक्तांलागी वस्त्रें भूषणें ।
कामायोग्य गजवाहनें । दिधली अनेक ॥ ५१ ॥
समस्तांसी बोळविले । वस्त्रालंकारीं सुखी केलें ।
त।व सीतामाईनें पाहिलें । हनुमंतासी ॥ ५२ ॥
विचार करीतसे चित्तीं । परमभक्त हा मारुति ।
सेवा करितां देहस्मृति । न ठेवी हा ॥ ५३ ॥
ऐसा हा निष्ठावंत । प्रभूचा प्राणसखा भक्त ।
पारितोषक या न देत । कवणनिमित्तें कळेना ॥ ५४ ॥
कंठींचा हार काढिला । कपीचे गळां घातला ।
वंदन करोनि चढला । वृक्षाग्रभागीं ॥ ५५ ॥
विचार करित निजमानसीं । रत्नें दिसती तेजोराशी ।
अंतरीं आहेत कैशीं । फोडोनि पाहूं ॥ ५६ ॥
वरी सुंदर दिसतें खासें । अंतरीं राम जरी नसे ।
तरी नाशिवंत ऐसें । ज्ञानी हातीं न धरिती ॥ ५७ ॥
वरिवरी शृंगारिले । अंतरीं कुबुद्धीनें भरले ।
ते जन नव्हेत चांगले । दुरी धरावे ॥ ५८ ॥
अंतर्बाह्य परीक्षी । तोच चतुर अंतरसाक्षी ।
नातरी उभयपक्षीं । हानीच होय ॥ ५९ ॥
हातीं धरोनियां रत्न । मुखीं घालोनि केलें चूर्ण ।
आंत न दिसे ठाण । श्रीरघुपतीचें ॥ ६० ॥
राम न दिसे तो दगड । फेंकून देई भक्त जाड ।
याची आम्हां नसे चाड । व्यर्थ भार कोण वाही ॥ ६१ ॥
चूर्ण करोनि फेंकित । तंव जानकी दुरोनि देखत ।
मनीं खेद मानीं बहुत । मर्कटा रत्नें व्यर्थ दिलीं ॥ ६२ ॥
दीर्घस्वरें पाचारिला । वृत्त जाणोनि प्रश्न केला ।
तुझे देही घनसांवळा । न दिसे कीं ॥ ६३ ॥
परिसोनियां वचनासी । कपि विदारी हृदयासी ।
तंव तेथें दृष्टीसी । रघुनंदन दिसतसे ॥ ६४ ॥
वामांकी जनकदुहिता । दक्षिणभागीं लक्ष्मणभ्राता ।
भरत शत्रुघ्न हनुमंता – । हृदयामाजीं देखिलें ॥ ६५ ॥
कंठ सद्गदित झाला । प्रेमपूर नयनीं आला ।
धन्य भक्त भला भला । शिरोमणि ॥ ६६ ॥
प्रभूसी कळली मात । पाचारिलें राजसभेत ।
धावोंनि मिठी घालीत । सिंहासन सोडोनी ॥ ६७॥
देव-भक्तांचें ऐक्य झालें । देहभान हरपलें ।
आनंदें डोलों लागले । सभाजन तटस्थ ॥ ६८ ॥
अंजनीमाय धन्य धन्य । पिता वायु परम धन्य ।
यासम भक्त नसे अन्य । त्रिभुवनीं ॥ ६९ ॥
ऐसी बहुतांपरी बहु स्तुती । करूं लागले यथामती ।
नाम आनंदें गर्जती । रघुपतीचें ॥ ७० ॥
आनंद कल्होळा परिसोनी । रामरायें मिठी सोडोनी ।
सभाजनांसी स्थिरावोनी । सिंहासनीं बैसले ॥ ७१ ॥
मग बोले सीतापती । यासी द्यावया त्रिजगतीं ।
वस्तु न मिळे कार्यसम ती । अनन्य भक्त प्राणसखा ॥ ७२ ॥
आवडी असे तुज भारी । रामकथामृतपान करीं ।
जंव कथा पृथ्वीवरी । तंव श्रवण करावी ॥ ७३ ॥
कठिणकाळीं साह्य व्हावें । सद्धर्मासी प्रतिपाळावें ।
रामभक्तीसी लावावे । असंख्य जन ॥ ७४ ॥
दुष्ट पातकी दुराचारी । भक्तां छळिती नानापरी ।
तयांसी तूं निवारीं । तपोबळें ॥ ७५ ॥
प्रभूनें ठेविला हनुमंत । अंशरूपें तो अवतार घेत ।
आज्ञा मनीं वागवित । स्थापितसे रामभक्ति ॥ ७६ ॥
द्वापारयुगामाझारीं । बैसोनि अर्जुनस्यंदनावरी ।
धर्मरक्षणा साह्य करी । बहु प्रकारीं ॥ ७७ ॥
गरुडगर्व हरण केला । भीमगर्व परिहारिला ।
धनंजयासी दाखविला । भक्तिप्रताप ॥ ७८ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय पहिला
समास तिसरा

कलियुग प्राप्त झाले । जाणिवेसी विसरले ।
आपत्तीनें व्यापिले । सर्व जन ॥ १ ॥
अल्पायुषी झाले प्रथम । तेजोबलहीन परम ।
बुद्धीस पडला भ्रम । सत्यासत्य कळेना ॥ २ ॥
स्वात्मसुखा नेणती । देहसुखा वाढविती ।
मार्ग चुकला ऐसें चित्तीं । नाणिती कदा ॥ ३ ॥
देहा चाळवी चैतन्य । तया ओळखितां अनन्य ।
चित्सौख्य लाभे पूर्ण । सर्वभावें ॥ ४ ॥
आत्मज्ञान विसरले । साधनांसी अव्हेरिलें ।
बाष्कळपणें बोलूं लागले । अन्योन्यासी ॥ ५ ॥
बहुतेकीं धर्म सोडिला । भरतभूमीं कांहीं राहिला ।
सत्पुरुषीं रक्षिला । वेळोवेळां म्हणोनिया ॥ ६ ॥
कलियुगाचे अंती । अधर्में ग्रासेल जगती ।
बीज रहावया निश्चितीं । अवतार होय ॥ ७ ॥
आपत्काळीं कृषिवल । बीजरक्षणीं दक्ष केवळ ।
तोचि सुज्ञ सुशील । स्थिरबुद्धी ॥ ८ ॥
भरतभूमी पुण्यदेश । सात्विकां सहाय विशेष ।
आत्मोन्नति व्हावयास । अनुकूल असे ॥ ९ ॥
अगणित पिकें धरणीं । नाना तीर्थें उत्तम पाणी ।
म्हणोनिया भगवंतांनीं । धर्म येथेंचि रक्षिला ॥ १० ॥
जैसे जैसे दिवस गेले । तैसें अधर्में ग्रासिलें ।
म्लेंच्छ उदंड वाढले । हिंसाधर्मी ॥ ११ ॥
तीर्थें क्षेत्रें भ्रष्टविलीं । देवालयें उद्ध्वस्त केलीं ।
गोवधाची झाली । परमसीमा ॥ १२ ॥
धार्मिकांसी भ्रष्टविती । सद्धर्मासी निंदिती ।
बहुत प्रकारें छळिती । भाविकांसी ॥ १३ ॥
सत्यधर्म सनातन । याचें करावया रक्षण ।
गोदातीरीं हनुमान । अंशरूपें अवतरले ॥ १४ ॥
रामदास नामें भले । भक्ति ज्ञानें चकित केलें ।
रामें स्वयें येवोनि उपदेशिलें । वायुनंदन साह्य करी ॥ १५ ॥
विवाहकालीं ‘सावधान’ । म्हणतां तोडिलें गृहबंधन ।
केलें बहुत अनुष्ठान । श्रीरामा तोषविलें ॥ १६ ॥
कुरवाळोनि भक्तासी । आज्ञा देती ‘दक्षिणदेशीं ।
जावोनि शिवरायासी । साह्य करावें ॥ १७ ॥
शिव स्थापील राजसत्ता । त्वां वाढवावें भक्तिपंथा ।
सद्धर्मा लावावें समस्तां । मलिन झाले’ ॥ १८ ॥
आज्ञा वंदोनिया शिरीं । पावले स्वामी कृष्णातीरीं ।
महाराष्ट्रदेशाभीतरीं । वास केला ॥ १९ ॥
स्वतेजें प्रकाशती । नाना चमत्कारांतें दाविती ।
उपासना दुमदुमविती । समुदाय थोर मेळविला ॥ २० ॥
रामनामाच्या घडघडाटें । महाराष्ट्रदेशीं अंबर फाटे ।
‘रघुवीर समर्थ’ म्हणोनि नेटें । भक्तजन गर्जती ॥ २१ ॥
शिवरायास कळली मात । सद्‍गुरु रामदास समर्थ ।
पावले अधर्मछेदनार्थ । दक्षिणदेशीं ॥ २२ ॥
स्वामीदर्शनाचे आशें । धुंडाळी वनें प्रदेशें ।
संतभेटी अनायासें । होईल कैसी ॥ २३ ॥
तळमळ लागली मोठी । अनुताप उपजला पोटीं ।
मग समर्थचरणीं मिठी । दृढ केली ॥ २४ ॥
उभयतांसि संतोष झाला । शिवाजीरूपें शिव आला ।
उपदेशवचनें बोधिला । धन्य धन्य म्हणोनि ॥ २५ ॥
सेवेच्छा दावी नृपति । स्वामी बोलती तयाप्रती ।
तुज सेवा ही निश्चितीं । धर्मरक्षणाची ॥ २६ ॥
राजधर्म केला कथन । दुर्जनीं गांजिले जन ।
स्त्रिया गाई ब्राह्मण । रक्षण करीं ॥ २७ ॥
श्रीकृपेवांचोनि खटपट । ती पोंचट आणि लटपट ।
रामउपासनेची लगट । करित असावी ॥ २८ ॥
भगवत्कृपा होतां पाहीं । जगीं दुर्मिळ नसे कांहीं ।
यास्तव रामभक्ति लवलाहीं । केली पाहिजे ॥ २९ ॥
विरक्त होऊनि शिवराज । स्वामीचरणीं अर्पितां राज्य ।
स्वामी म्हणती आम्हां गरज । नसे याची ॥ ३० ॥
‘जोहार’ मोडोनी ‘रामराम’ करवीं । मारुती स्थापीं गांवोगांवी ।
भगवा झेंडा जगीं मिरवी । हिंदुत्वाचा ॥ ३१ ॥
दासबोध वीस दशक । केला ग्रंथ आध्यात्मिक ।
विवरतां इहपर सुख । प्राप्त होय ॥ ३२ ॥
‘मनाचीं शतें’ आदिकरोनि । कविता लिहिली अमोल वाणी ।
कीं ही ब्रह्मरसाची खाणी । शब्दरूपें दाविली ॥ ३३ ॥
काष्ठाच्या खडावा पायांत । कुबडी स्मरणी हातांत ।
कौपीन मेखला भगवी शोभत । खांद्यावरी ॥ ३४ ॥
भृकुटीं आवाळूं वागविती । जटाभार दिव्य कांती ।
द्वादश मुद्रा शोभती । गिरिकंदरीं नित्य वास ॥ ३५ ॥
शिष्यसंप्रदाय वाढला । शिवबा निजधामा गेला ।
स्वामींनीही निरोप घेतला । ज्योतीस ज्योत मिळाली ॥ ३६ ॥
सज्जनगड समाधिस्थान । स्थापिलें श्रीरामाचें ठाण ।
नित्य पूजन अन्नदान । होत असे ॥ ३७ ॥
ऐसा काळ बहुत गेला । कांहीं कार्यभाग चालला ।
दिवसेंदिवस कलि वाढला । अधर्में जाळें पसरिलें ॥ ३८ ॥
जैसा जैसा कलि वाढे । तैसें धर्मा क्षीणत्व जडे ।
शहाणेंही होती वेडे । कलिप्रतापें ॥ ३९ ॥
म्लेंच्छसत्ता उडाली । मराठेशाही चालली ।
पुढें आंग्लसत्ता आली । कालक्रमें ॥ ४० ॥म्लेंच्छीं छळोनि भ्रष्टविलें । मध्यें कांहींसे रक्षिले ।
परधर्मापाठीं लागले । अजाणपणें ॥ ४१ ॥
सनातनधर्मीं लोकां । अध्यात्मविद्या मुख्य जे कां ।
तदनुरोधें आचारादिका । नियमन केलें ॥ ४२ ॥
उत्तम क्वचित् लाभतें । मिळवाया कष्टावें लागतें ।
तनुमनधन वेंचावें तें । तरीच जोडे श्लाघ्यता ॥ ४३ ॥
आधीं कष्टानें मिळतें । विषमकाळीं दुर्लभ होतें ।
चित्ता मलिनता येते । विवेका ठाव नाहीं ॥ ४४ ॥
वडिलीं शुद्धज्ञानाचा धडा । शिकाया घातला आचार गाढा ।
परि निष्कळ वाटे मूढां । सांडिली साधनें ॥ ४५ ॥
क्षण एक वाटतें चित्तीं । शुद्ध बीज मिळवावें हातीं ।
प्रयत्ना सांडिलें वृत्ती । विषयालस्यें ॥ ४६ ॥
आंबट म्हणूनि फळें टाकिलीं । जंबुकशी वृत्ती झाली ।
जनता सैराट धांवली । प्रवृत्तिज्ञान शोधाया ॥ ४७ ॥
ज्ञानामाजीं दोन भेद । प्रवृत्ति निवृत्ति विशद ।
निवृत्तिज्ञानें सकल साध्य । होत असे ॥ ४८ ॥
प्रवृत्तिज्ञान भेदयुक्त । देहसुखातें वाढवित ।
संपत्ति बलातें देत । सुखसोयी ॥ ४९ ॥
जें नाशिवंत गणले । वेदासवें गुप्त झालें ।
सत्य कांहीसें राहिलें । निवृत्तिज्ञान ॥ ५० ॥
सत्य राहे शाश्वत । दृश्य तें तें अशाश्वत ।
चौदा-चौसष्टींची मात । बुडत गेली ॥ ५१ ॥
कांहीसा वेद राहिला । स्तुति-नीतिरूपें उरला ।
निवृत्तिमार्ग बुडाला सर्वस्वेंसी ॥ ५२ ॥
विप्र केवळ धर्ममूर्ति । क्षत्रिय तयांते रक्षिती ।
वैश्य शूद्र संगतीं तरती । ऐशी स्थिती बुडाली ॥ ५३ ॥
विप्र क्षत्रिय पुढारी । वर्तों लागले अनाचारीं ।
वैश्यीं शूद्रींही त्यापरी । कृषिसेवा सोडिली ॥ ५४ ॥
वर्णाश्रमधर्म बुडाला । आत्मोन्नतीचा मार्ग खुंटला ।
धर्मशास्ता नाहीं उरला । भूमंडळीं ॥ ५५ ॥
घरची कुलवधू टाकिली । कुलटा हवीशी वाटली ।
तिचे ठायीं रंगूं लागली । वृत्ती जयांची ॥ ५६ ॥
अधोमार्गाचे दीपक । म्हाणती आम्ही सुधारक ।
स्वैर आचाराचें सुख । वाटों लागलें ॥ ५७ ॥
व्हावया चित्तशुद्धि । वेदप्रणीत क्रियाविधि ।
आचरितां भवनदी । तरोनि जाय ॥ ५८ ॥
चित्तशुद्धि होय जैशी । प्राणी पावती जन्मासी ।
उच्चनीच वर्णांसी । योग्यतेसारिखे ॥ ५९ ॥
वर्णाश्रमधर्में वर्ततां । चित्ता येतसे शुद्धता ।
म्हणोनि वेद आंखिता । यथाक्रम जाहला ॥ ६० ॥
क्वचित् कोणी भाग्यवंत । भक्तिबळें शिखरा जात ।
परि क्रमाक्रमानें चालत । बहुतेक जन ॥ ६१ ॥
कांही उफराटे चालती । नीचयोनीप्रति जाती ।
कलिधर्में बहुतांची वृत्ति । मागें धांवे ॥ ६२ ॥
कर्महीन झाले सकळ । गेलें आयुष्य आणि बळ ।
मुमुक्षु पडिले विकळ । अंधत्व आलें ॥ ६३ ॥
भविष्य जाणोनि भगवंतें । सोपे सुलभ मार्गातें ।
दाविलें, नाम एकचित्तें । स्मरतां सकलसिद्धी ॥ ६४ ॥
उच्चनीच सर्व याती । नाम स्मरतां मुक्त होती ।
चित्तशुद्धि आणि भक्ति । प्राप्त होय ॥ ६५ ॥
अज्ञ विकल्पी दुराचारी । अशांसही नाम तारी ।
पातकाची नुरे उरी । ज्ञानबोधें ॥ ६६ ॥
कलियुगीं नाम साधन श्रेष्ठ । इतर साधनीं बहु कष्ट ।
अधिकारयुक्त कर्मनिष्ठ । उरला नाहीं ॥ ६७ ॥
परि मुमुक्षुची तळमळ न जाय अंतरींचा मळ ।
संतीं दाखविला सोज्ज्वळ । भजनमार्ग ॥ ६८ ॥
नेणती स्वधर्मकर्म । करूं जाता चुके वर्म ।
उभय हानी कष्ट परम । समाधान नाहीं ॥ ६९ ॥
यास्तव साधुजनीं । बहुतां लाविलें भगवद्भजनीं ।
ज्ञानेश्वर आदिकरोनी । सिद्धपुरुषीं ॥ ७० ॥
बहुतेकीं आदरिलें । कर्मठांनीं अव्हेरिलें ।
कर्मही सांग न झालें । कलिप्रतापें ॥ ७१ ॥
भजनमार्ग आजींचा नव्हे । चहूं युगीं सारखा स्वभावें ।
स्वयें आचरिला सदाशिवें । समाधान पावावया ॥ ७२ ॥
आचार भष्ट जाहलें । मंत्रसामर्थ्य कांहीं न चाले ।
समाधान दुरी राहिलें । निश्चयेंसी ॥ ७३ ॥
वेद गेले भजन गेलें । जन अभिमानडोहीं बुडाले ।
उभयपक्षीं नागवले । सर्वस्वेंसी ॥ ७४ ॥
अन्न न मिळे उदरपूर्ती । अंगिकारिली क्षुद्रवृत्ती ।
नीचयाती हेवा करिती । सामसाम्यें ॥ ७५ ॥
नास्तिक झाले प्रबळ । गुरुत्व ज्ञान तपोबळ ।
लया जावोनि केवळ । अभिमानीं राहिले ॥ ७६ ॥
सामर्थ्य नसतां सत्ता । कोणी न मानी तत्त्वतां ।
अपमान उपहास्यता । होऊं लागली ॥ ७७ ॥
ऐशी उभयपक्षीं हानि । स्वधर्म दिधले टाकोनि ।
उदरपूर्तीवांचोनि । अन्य साधनें राहिलीं ॥ ७८ ॥
थोर कुळें हीनत्वा आली । नाना आपत्तींनीं ग्रासिलीं ।
आहार-विहारें भ्रष्टलीं । कितीएक ॥ ७९ ॥
याकारणें जाहला अवतार । अवलोकिती आचार ।
सुलभसाधनीं नर अपार । रामभजनीं लाविले ॥ ८० ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय पहिला
समास चवथा

भाविक जनां सुविचार । न सुचे इह आणि पर ।
म्हणोनि सद्‍गुरुअवतार । ईशेच्छेनें लाधला ॥ १ ॥
महाराष्ट्रीं माणदेशीं । परमपवित्र ब्राह्मणवंशी ।
अवतरले पुण्यराशी । सद्‍गुरुराय ॥ २ ॥
मातापितरा आनंद झाला । अंतर्निष्ठांनीं ओळखिला ।
कार्यकर्ता पुरुष भला । हनुमदंश ॥ ३ ॥
बालपणीं क्रीडा ज्याची । देवतार्चनपूजेची ।
आवडी वृद्धसेवेची । सकलां प्रिय ॥ ४ ॥
उपजत ज्ञान ज्या लाधलें । त्यासी जनव्यवहारें शिकों घातलें ।
लोकाचारें वर्तलें । पाहिजेच कीं ॥ ५ ॥
करिती मौंजी-विवाहादिक । मातापिता पुरविती कौतुक ।
म्हणती प्रपंचभार चोख । वाहील सुपुत्र आमुचा ॥ ६ ॥
लोकाचारें वर्तविती । क्षुद्रवृत्तीसी लाविती ।
सांभाळी आपुली वृत्ती । उपदेशिती पुत्रस्नेहें ॥ ७ ॥
महत्कार्य आणोनि चित्तीं । जनासारिखे वागती ।
सूक्ष्मदृष्टीं न्याहाळिती । स्थिति सर्व ॥ ८ ॥
कळवळा उपजला पोटी । अज्ञानें जनां हानि मोठी ।
उत्तम देह पावोनि शेवटीं । अधोगती चालले ॥ ९ ॥
कर्महीन भक्तिहीन । श्रद्धाहीन विवेकहीन ।
आर्जवें निर्वाह करोन । राहती निरुपायें ॥ १० ॥
सन्मार्गीं लावावें यांसी । करुणा उपजली मानसीं ।
कार्यारंभीं भगवंतासी । आपुलेसें करावें ॥ ११ ॥
भगवत्कृपेवांचून कांही । केवळ प्रयत्न सिद्धी नाहीं ।
समर्थें दासबोधीं पाहीं । कथिले असे ॥ १२ ॥
धरिला मनुजावतार । तैसाचि आचारविचार ।
साधनीं झिजविलें शरीर । साधकवृत्तीं ॥ १३ ॥
व्हावया आत्मज्ञान । सद्गुरूसी रिघाले शरण ।
सेवा केली अतिगहन । गुरुकृपा संपादिली ॥ १४ ॥
केलीं बहुत साधनें । तोडिलीं सकल बंधनें ।
श्रीरामाचे दर्शनें । धन्य झालें ॥ १५ ॥
सद्‍गुरु बोलती वचन । ‘दुर्धर कलि वाढला गहन ।
जीव अज्ञानी मतिहीन । रामभजनीं लावावे ॥ १६ ॥
लोकसंग्रह करावा । प्रपंच थोर वाढवावा ।
अडला भुलला बोधावा । युक्तिप्रयुक्तीं ॥ १७ ॥
नाना प्रापंचिक व्यवसाय । पुरवोनि दावीं भजनसोय ।
बुडत्यासी तरणोपाय । सुचवित जावे’ ॥ १८ ॥
आज्ञा वंदोनी शिरीं । गुरुसेवा केली पुरी ।
निघाला भक्तकैवारी । जगदुद्धाराकारणें ॥ १९ ॥
सिद्धपणें विचरती । भूमंडळी नाना तीर्थीं ।
सूक्षदृष्टीं अवलोकिती । स्थिति सर्व ॥ २० ॥
जागोजागीं स्थापिले मठ । भजनीं लाविले भाविक खट ।
सुलभोपायें दाविली वाट । परमार्थाची ॥ २१ ॥
प्रपंच करोनि अलिप्त । अध्यात्मज्ञानें समाधान देत ।
तापत्रयांतूनि काढित । असंख्य नर ॥ २२ ॥
ज्याचा जैसा अधिकार । तैसें साधन लहानथोर ।
दावूनि भवसिंधु पार । पावविती ॥ २३ ॥
शांति जयांची आगळी । कल्पांतींही न डळमळी ।
स्वानंदस्थिति जी निराळी । न होईल कदापि ॥ २४ ॥
भक्तकामना पुरविती । देहदुःखें दूर करिती ।
भूतपिशाचें नेणो किती । उद्धरिलीं दर्शनमात्रें ॥ २५ ॥असंख्य धेनु पाळिल्या । कसायापासोनि सोडविल्या ।
तैशा कित्येकांसी त्या दिधल्या । पाळावयाकारणें ॥ २६ ॥
नित्य होतसे अन्नदान । तृप्त होती असंख्य जन ।
अन्नपूर्णा स्वयें येवोन । अन्नपूर्ती करीतसे ॥ २७ ॥
नास्तिकांचे समाधान । साक्षात्कारें करिती पूर्ण ।
भक्तिपंथा लावूनि जाण । दुष्ट पातकी उद्धरिले ॥ २८ ॥
सकलांठायीं समदृष्टी । आपपर भाव न ये पोटीं ।
दर्शनें चरणीं पडे मिठी । पूज्यभाव प्राप्त होय ॥ २९ ॥
क्षणएक घडतां संगति । आनंद न समाये चित्तीं ।
नयनीं अश्रुपूर लोटती । गुरुचरणक्षालना ॥ ३० ॥
शिष्यसंप्रदाय वाढला । सच्छिष्यां स्वाधिकार दिला ।
रामनामाचा गजर केला । भूमंडळीं ॥ ३१ ॥
नास्तिकां लाविलें सुवाटें । ज्ञानियांचे मोडले ताठे ।
अज्ञानियां भक्तिपेठे । नेऊनि बैसविले ॥ ३२ ॥
स्वयें बहुत तारिले । शिष्यांकरवींही उद्धरिले ।
राममंदिरां स्थापिलें । जागोजागीं ॥ ३३ ॥
सर्वत्रांसी आज्ञा एक । रामनाम घ्या निःशंक ।
सुख लाभेल ब्रह्मादिक । वांछिती जें ॥ ३४ ॥
ऐसें बहुत कार्य केलें । तंव देह क्षीणत्व आलें ।
स्वस्वरूपीं मीनले । पंचकोश सांडोनी ॥ ३५ ॥
वद्य दशमी मार्गशीर्षमास । समाधीचा पुण्य दिवस ।
येती जे दर्शनास । सद्‍गुरुधामीं ॥ ३६ ॥
तयां समाधान होय चित्तीं । सेवा करितां सायुज्यप्राप्ती ।
वारी करितां कामना पुरती । भाविकांच्या ॥ ३७ ॥
ऐसें हें अगाध चरित्र । श्रवणें होईजे पवित्र ।
पूर्वपुण्य असेल सूत्र । तरी आवडी श्रवणाची ॥ ३८ ॥
श्रवण करावें एकचित्तें । अर्थें विवरावें तयातें ।
तोडोनिया बंधनातें । सिद्धचालीं चालावें ॥ ३९ ॥
तंव श्रोतीं केला प्रश्न । स्वल्पसंकेतें दाविली खूण ।
तेणें तृप्त न होती श्रवण । विशद करावें ॥ ४० ॥
कोण देश कोण धाम । कोणे कुळीं घेतला जन्म ।
गुरुलीला पावन परम । सविस्तर सांगावी ॥ ४१ ॥
गुरुपरंपराविस्तार । कैसा केला जगदुद्धार ।
भक्त कोण थोर थोर । गुरुकृपा पावले ॥ ४२ ॥
कैसें साधन कैसें भजन । दुःखमुक्त झाले कोण ।
कैसें केलें अन्नदान । कथन करावें ॥ ४३ ॥
मंदिरें स्थापिलीं किती । गोरक्षणाची कैसी स्थिती ।
कैसी अवतारसमाप्ती । स्पष्टोक्ती सांगावी ॥ ४४ ॥
वक्ता बोले जी वचन । गुरुलीला परम गहन ।
मी तंव असें अज्ञान । वर्णूं न शकें ॥ ४५ ॥
परि कृपा केलिया गुरुनाथें । असाध्य तें साध्य होतें
वंदू चरण एकचित्तें । श्रीसद्‍गुरूंचे ॥ ४६ ॥
कृपाप्रसाद वोळेल जरी । पुढील अध्यायीं सविस्तारीं ।
अंतरी राहोनी विवरी । सद्‍गुरुस्वामी ॥ ४७ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ४८ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥
॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय दुसरा
समास पहिला

महाराष्ट्रिं या माणगंगातिरातें । असे पुण्य गोंदावलें क्षेत्र तेथें ॥
यजुर्वेदि विप्रगृहीं जन्म घेती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ २ ॥

जयजय श्रीज्ञानसूर्या । सच्चिदानंदा गुरुराया ।
अवस्था भेदोनि तुर्या । सहजस्थितिनिवासा ॥ १ ॥
तुझिय कृपाप्रकाशें । वस्तुजात तितुकी दिसे ।
स्पष्टपणें उमजत असे । नित्यानित्य ॥ २ ॥
उदय होतां गभस्ती । डोळस क्रिया चालती ।
अज्ञानाची निवृत्ति । होत असे ॥ ३ ॥
तैसा सद्गुनरु दिनकर । दवडी अज्ञान अंधकार ।
भाविकांसी पैलपार । ज्ञानतेजे पाववी ॥ ४ ॥
जे अज्ञानरजनी निजेले । स्वस्वरूप विसरले ।
जन्ममरणस्वप्नीं भ्रमले । सदोदित ॥ ५ ॥
कोणी अहंकारे उन्मत्त होती । घरघरां घोरों लागती ॥
तस्कर हिरावोनि घेती । अर्थ ज्यांचे ॥ ६ ॥
कित्येक अंधारी फिरती । सर्प विंचू दंश करिती ।
दुःखें तळमळोनि पडती । अधोभागीं ॥ ७ ॥
लोभमोहाचेनि नेटें । स्वप्नवैभव खरें वाटे ।
सवेंचि जातां भ्रष्टे । वृत्ति जयांची ॥ ८ ॥
कित्येक नृप थोर थोर । स्वप्नीं भिक्षा दारोदार ।
मागोनि भरती उदर । हारपले स्वसत्ते ॥ ९ ॥
मुमुक्षु अत्यंत बिहाले । जन्ममृत्युपिशाच्च देखिलें ।
चातकापरी पाहों लागले । वाट उदयाची ॥ १० ॥
विषयपरागाचेनि संगें । कमलसुमनीं गुंतले भुंगे ।
उदय होतांचे वेगें । मुक्त होती ॥ ११ ॥
दक्षाचियें पोटीं । उद्यमाची आवडी मोठी ।
परि अंधाराची मिठी । कांही न चाले ॥ १२ ॥
तैसे बद्ध मुमुक्षु अंध । झाले असती सखेद ।
जंव ज्ञानसूर्य गुरुपद । उदय न पावे ॥ १३ ॥
तमीं दाटलें चित्त । मोहानें भ्रमोनि बरळत ।
तयां सद्गुंरु अभय देत । ज्ञानज्योती उजळोनि ॥ १४ ॥
कैसें नवल उदयाचें । नाशिले विकार त्रिगुणांचे ।
तुर्यातीत अवस्थेचें । ज्ञान होय ॥ १५ ॥
तम म्हाणजे अंधकार । दीपतेज रजोविकार ।
सत्त्व चांदणे निर्धार । लया गेलें ॥ १६ ॥
सर्वसाक्षिणी तुर्या अवस्था । येतसे साधकांचे हातां ।
भवसिंधु तरूनि जातां । सुलभ होय ॥ १७ ॥
अरुणोदयाचे संधी । अनुतापें जैं चित्तशुद्धी ।
तैं ज्ञानोदय कृपानिधी । सद्गुुरुनाथ ॥ १८ ॥
मग वासना निमाली । मना उन्मनता आली ।
ज्ञानदृष्टी पैसावली । भूतीं देखे भगवंत ॥ १९ ॥
तैसी भक्ति घर रिघे । वैराग्य रोमरंध्रीं जागे ।
ज्ञानरूप होवोनि अंगें । सहजानंदी निमग्न ॥ २० ॥
ऐसा ज्ञानसूर्य गुरुवर । मुमुक्षुचातकां आधार ।
निजसखा हाचि निर्धार । इतर सर्व मायिक ॥ २१ ॥
रविहूनि तेजाळ । परि उष्ण ना शीतळ ।
विकाररहित निर्मळ । सहज समाधी ॥ २२ ॥
उदयास्त पावे भास्कर । सद्गु रु नित्य निरंतर ।
आदिमध्यान्तविकार । नाहीं तेथें ॥ २३ ॥
उदय होतां गभस्ती । सत्यासत्य क्रिया चालती ।
होतां सद्गुभरुप्राप्ती । विमलमार्गी पवाडे ॥ २४ ॥
उदय पावले सद्गु्रु । लीला तयांची आदरूं ।
साष्टांगी वंदन करूं । प्रेमळ भावें ॥ २५ ॥
मागां श्रोतीं जे पुसिलें । गुरुलीला विशद बोलें ।
सप्रेम वंदोनि पाउलें । निरूपिजेल ॥ २६ ॥
येरवीं सांग गुरुकथा । गुरुवांचोनि दुजा न वक्ता ।
परि व्हावया समाधान चित्ता । आला प्रसाद अंगीकारूं ॥ २७ ॥
अनंतकोटि ब्रह्मांड । माजीं पृथ्वी नवखंड ।
त्यांतील जें भ्रतखंड । पुण्यभूमी ॥ २८ ॥
जें धनधान्यादिकें समृद्ध । सुवर्णभूमी नामें प्रसिद्ध ।
जेथें मूर्तिमंत वेद । नांदतसे ॥ २९ ॥
जें विद्येचे माहेत । ज्ञानाचें असे कोठार ।
सत्त्वगुणें केलें घर । पुण्यक्षेत्र म्हणोनि ॥ ३० ॥
हरिहरादिक मूर्ति । नित्य नूतन अवतार घेती ।
दुष्टां छेदोनि सुखी करिती । सर्व जन ॥ ३१ ॥
कृषीवल नांगरी शेत । हरळी कुंदा काढीत ।
उत्तम पिकें होय युक्त । भूमिका जेवीं ॥ ३२ ॥
तैसीं हरिहरादिक भले । वेळोवेळां काढिती किडाळें ।
श्रेष्ठ पुरुष सत्त्वागळे । प्राप्त होती ॥ ३३ ॥
भगीरथें गंगा आणिली । सदाशिवें वसति केली ।
पुंडलिकें विटे माउली । भक्तजनां आधार ॥ ३४ ॥
कोणी सूर्यातें झांकिती । देवशत्रु विदारिती ।
कोणी समुद्र प्राशिती । तपोबळें ॥ ३५ ॥
कित्येक देवांशीं झुंजती । त्रिलोकीं सत्ता स्थापिती ।
कोणी धैर्याची मेरुमूर्ति । होऊनि गेले ॥ ३६ ॥
विश्ववायु निरोधी कोणी । प्रतिसृष्टि निर्मिती ज्ञानी ।
कित्येक स्वस्वरूपा पावोनि । निश्चल झाले ॥ ३७ ॥
कोणी निर्जीवा चालवी । पशुमुखें वेद बोलवी ।
स्वर्गींचे पितर जेववी । प्रत्यक्ष येथें ॥ ३८ ॥
देहाच्या करी पुष्पें तुलसी । देहासहित वैकुंठवासी ।
पाषाणमुखीं ग्रासासी । घाली कोणी ॥ ३९ ॥
ऐसा जो कां पुण्यदेश । भक्तिभावें पावन विशेष ।
नाना तीर्थांचे प्रदेश । जया ठायीं ॥ ४० ॥
तयाचे दक्षिणदिग्भागीं । कृष्णा गोदा चालिल्या वेगीं ।
पावन करित भेटीलागीं । सरित्पतीच्या ॥ ४१ ॥
महाराष्ट्र नामें देश । दोन्ही नद्या मध्यप्रदेश ।
माणगंगातटाक विशेष । माण नामें प्रसिद्ध ॥ ४२ ॥
ऐशिया माणदेशीं । गोंदावलें नाम ग्रामासी ।
बुद्रुक संज्ञा जयासी । तें सद्गुरूंचें जन्मस्थान ॥ ४३ ॥
पूर्वदिशे पंढरपूर । सहा योजनें असे दूर ।
मार्गीं जो कां सिद्धेश्वर । म्हसवडीं नांदे प्रसिद्ध ॥ ४४ ॥
दक्षिणेसी शुकस्थान । दुजें कुरोली सिद्ध जाण ।
सिंहनाद होतो गहन । परम पावन क्षेत्र जें ॥ ४५ ॥
पश्चिमे वेरळातीरासी । नागनाथ क्षेत्र परियेसीं ।
उत्तरे शिखर शिंगणापुरासी । कैलासपती नांदतसे ॥ ४६ ॥ माणगंगातीरासी । ज्ञानवापी संगमासी ।
पुण्यक्षेत्रीं गोंदावलीशीं । भीमाशंकर स्थान असे ॥ ४७ ॥
असो ऐशिया क्षेत्रांत । विप्रकुटुंब नांदत ।
‘घुगरदरे’ उपनाम विख्यात । पूर्वीं होतें प्रसिद्ध ॥ ४८ ॥
अंगिकारिली जैं वृत्ती । कुलकर्णी ऐसें बाहती ।
इनाम मिळविली शेती । इनामदार कोणी म्हणे ॥ ४९ ॥
देशस्थ यजुर्वेदी बाह्मण । शाखा असे माध्यंदिन ।
वसिष्ठ गोत्र असे जाण । सुप्रसिद्ध तें ॥ ५० ॥
उदरनिर्वाहापुरती । लेखनवृत्ती आदरिती ।
गृहस्थाश्रमीं वर्तती । नीतिन्यायें ॥ ५१ ॥
जयांचे कुळीं दैवत । मुख्यत्वें असे पंढरीनाथ ।
शुद्ध एकादशी नेमस्त । वारी जयांची ॥ ५२ ॥
नित्य होत हरिभजन । आवडी नामसंकीर्तन ।
मुद्रा माळा हें भूषण । असे जयांचें ॥ ५३ ॥
वंशवृक्ष विस्तारला । फलपुष्पभारें शोभला ।
लिंगोपंत नामें भला । पुरुष झाला विख्यात ॥ ५४ ॥
संपत्ति जयाची आगळी । उत्तरोत्तर वाढली ।
धान्यादिकें समृद्धी झाली । बहुप्रकारें ॥ ५५ ॥
सुंदर गाई वांसरें । महिषी वृषभ जनावरें ।
शेळ्या आणि कोंकरें । कितीएक ॥ ५६ ॥
दासदासी कुलवाडे । शेती चालली धडाडे ।
धनधान्याचा ढीग पडे । भाग्यवंत ॥ ५७ ॥
ग्रामाधिकार यथान्याय । चालवी, न करी अन्याय ।
अधिकारीवर्ग गुण गाय । बहुप्रकारें ॥ ५८ ॥
संपत्ति घरीं पाणी भरी । आणि परमार्थी आवडी भारी ।
दोन्ही नांदती एकसरी । ऐसें स्थळ दुर्मिळ ॥ ५९ ॥
लक्षीमदें नर धुंद होती । लक्ष्मीनायका विसरती ।
न कळे धर्माधर्म नीति । विषयभोगीं अतृप्त ॥ ६० ॥
स्वेच्छाचारे वर्तती । सुज्ञासी धर्मवेडा म्हणती ।
आयुष्य जाईल विलयाप्रती । ऐसें स्वप्नीं न ये कदा ॥ ६१ ॥
जेथें श्री आणि श्रीधर । उभय कार्य चाललें थोर ।
तो भगवदंश निर्धार । सत्य सत्य जाणावा ॥ ६२ ॥
लिंगोपंत अत्यंत सात्त्विक । गृहधर्म पाळी अशेख ।
अतिथिसेवा निःशंक । अत्यादरें करितसे ॥ ६३ ॥
पंढरीकुलधर्म घरीं । नित्य नेमें वारी करी ।
भजन कळाकुसरीं । टाळ वीणा मृदंग ॥ ६४ ॥
प्रातःकाळी करूनि स्नान । ब्रह्मकर्म देवतार्चन ।
भगवद्गीता करी पठण । अतिप्रीतीं ॥ ६५ ॥
नित्य हरिपाथ वाची । आल्या अतिथा अन्न वेचीं ।
आवडी अध्यात्मश्रवणाची । जयालागीं ॥ ६६ ॥
रात्रौ हरिभजनीं सादर । वाणी जयाची मधुर ।
प्रेमें वाहे नयनीं नीर । नाचतसे प्रेमभरें ॥ ६७ ॥
भगवच्चरणी अढळ लक्ष । प्रपंची उद्यमी अति दक्ष ।
दीनाचा घेऊनी पक्ष । युक्तिप्रयुक्तीं सांभाळी ॥ ६८ ॥
भार्या राधा पतिव्रता । पतिवांचूनि देवता ।
न मानी जी तत्त्वतां । एकनिष्ठ सेवा करी ॥ ६९ ॥
गृहीं गृहिणी शोभली । बाह्य कीर्ति पैसावली ।
तया भाग्याची साउली । इच्छिती जन ॥ ७० ॥
संसार थोर चालला । संतती-संपत्तीनें भरला ।
रावजी नामें पुत्र झाला । स्थिरबुद्धी ॥ ७१ ॥
विद्या वृत्ति-व्यवहार । शिकवोनि केला थोर ।
मग विवाहाचा विचार । करों लागले ॥ ७२ ॥
वर पहावया अनेक । गांवोगांवचे येती लोक ।
विद्या वैभव वागणूक । वररूप पाहती ॥ ७३ ॥
कोणी वैभव वांछिती । कोणी वयसीमा पाहती ।
कोणी शरीरसंपत्ति । आणि स्वरूप ॥ ७४ ॥
कोणी म्हणती पाहिजे वर केवळ । नको सासूसासर्यांचा छळ ।
नणंदा-जावांचा जोंजाळ । असूंच नये ॥ ७५ ॥
म्हणती वर विद्वान् असावा । कोणी म्हणे उद्यमी असावा ।
धारिष्टें असावा बरवा । सकलां ठायीं ॥ ७६ ॥
कोणी म्हणे भलतें झालिया । स्थावर असावें खाया ।
हिस्सेरशीनें जांवया । काय येईल ॥ ७७ ॥
कित्येक जे बिडालबुद्धी । विक्रये खाती द्रव्यनिधी ।
असेल जें जें प्रारब्धीं । तैसें कन्येचें होईल ॥ ७८ ॥
न पाहती वयसीमा । कुल विद्या आणि आरामा ।
कन्याविक्रयी अधमाधमा । अधोगती होतसे ॥ ७९ ॥
कित्येक धनानें भुलले । अधर्माचे पाये घातले ।
कुलवंत सात्त्विक भले । विरळा शोधी ॥ ८० ॥
असो ऐसी लोकस्थिती । नोवर्या सांगोन येती ।
लिंगोपंत विचारी चित्तीं । वधू कैसी योजावी ॥ ८१ ॥
मातुलगृहींचे आचार । संतती करिते अंगीकार ।
जाणोनि हा आधार । सूक्ष्मदृष्टीं न्याहाळी ॥ ८२ ॥
कुलवंत बुद्धिवंत । आचारशील दयावंत ।
विवेकी आणि भगवद्भक्त । असतां भली ॥ ८३ ॥
अधर्में धन मेळविती । धार्मिकाचा आव आणिती ।
धना पाहुनी भुलती । कितीएक ॥ ८४ ॥
अथवा धनाचे मदभारें । वागती नाना कुविचारें ।
म्हणोनि सूक्ष्मविचारें । निरीक्षण करी ॥ ८५ ॥
दैवयोगें दारिद्र्य आले । नीतीनें पाहिजे भोगिलें ।
कुनीतीकरितां गेलें । श्रेष्ठत्व कुळाचें ॥ ८६ ॥
पूर्वजांची महाव्याधी । क्वचित् संततीसी बाधी ।
यास्तव तो सूक्ष्मबुद्धी । शोधीतसे ॥ ८७ ॥
वाघमारे कलढोणकर । सात्विक सज्जन इनामदार ।
नारायणकन्या उपवर । निश्चित केली ॥ ८८ ॥
विवाहसमारंभ केला । वधूप्रवेश गृहीं झाला ।
गीतानामें पाचारिती जिला । उभयकुलोद्धारक ती ॥ ८९ ॥
लिंगोपंत वृद्ध झाले । प्रपंच करोनि थकले ।
रावजीहातीं काज दिलें । नीतिन्यायें सांभाळीं ॥ ९० ॥
मज आले वृद्धपण । हरिचिंतनावांचूनि जाण ।
आतां काज नसे अन्य । उचित बापा ॥ ९१ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीलामृते द्वितीयाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय दुसरा
समास दुसरा

संसारगाडा चालला नीट । लिंगोपंत झाले जरठ ।
वारी करितां बहु कष्ट । होऊं लागले ॥ १ ॥
परि एकनिष्ठ वैष्णव । विठ्ठलचरणीं दृढभाव ।
देहाची ज्या नसे कींव । वारीपुढें ॥ २ ॥
ऐसा काळ बहुत गेला । विठ्ठला कळवळा आला ।
भक्तिप्रेमे पाझरला । धांव घेई ॥ ३ ॥
देव भक्तांची माउली । भक्तचिंता त्यास लागली ।
वृत्ति पाहिजे विश्वासली । परि तेंचि कथिण ॥ ४ ॥
स्वप्नीं येवोनि सांगत । तुझी भक्ति दृढ बहुत ।
देज्खोनि प्रसन्न मी पंढरीनाथ । झालो आजीं ॥ ५ ॥
तव देह जीर्ण झाला । परि भक्तिभाव वाढला ।
वारी करितां भागला । बहु दिससी ॥ ६ ॥
तरी आतां ऐसें न सोसावें । तूं कष्टतां मी दुखवे ।
आज्ञापितो तें ऐकावें । एकचित्तें ॥ ७ ॥
तुझिया भक्ति भुलोनि । आलों असें तव सदनीं ।
विठ्ठलरखुमाई मूर्ति दोन्ही । विहिरीमाजीं असती ॥ ८ ॥
काढोनियां मूर्तींप्रती । स्थापन कराव्या वेदोक्तीं ।
नित्य पूजा पंचारती । अतिआदरें करावी ॥ ९ ॥
तयांचे घेतां दर्शन । वारी होईल परिपूर्ण ।
येविषयीं संशयी मन । करों नये ॥ १० ॥
ऐसा दृष्टांत होतां पाहीं । मूर्ति काढल्या लवलाही ।
यथाविधी स्थपिल्या गृहीं । अत्यानंदें ॥ ११ ॥
नित्यपूजा नैवेद्यासी । जमीन दिधली देवासी ।
सेवा करिती अहर्निशी । निरालम्यें ॥ १२ ॥
कुळीं जयांच्या भगवंत । प्रत्यक्ष असे नांदत ।
तयांची थोरवी वर्णूं येथ । किती म्हणोनि ॥ १३ ॥
सुकृतें जयांचीं आगळीं । ते नर जन्मती या कुळीं ।
उत्तरोत्तर भक्ति जिव्हाळीं । वाढों लागे ॥ १४ ॥
नदी उगमीं सूक्ष्म वाहत । पुढतपुढती प्रवाह वाढत ।
समुद्रमिळणीं न लागे अंत- । पार जियेचा ॥ १५ ॥
संगमी समरस होये । वेगळेपणें काढितां नये ।
सागर होवोनि राहे । भेदरहित ॥ १६ ॥
सूक्ष्म प्रवह ओहोळ नाले । सरळी सरोवर निघाले ।
मिळणी मिळतां एकचि झाले । संगतीं तारिले असंख्य ॥ १७ ॥
तैसी ही कुलनदी । ब्रह्मरसीं मीनली अनादि ।
तारिली असंख्य शिष्यमांदी । बोधामृत पाजूनिया ॥ १८ ॥
लिंगोपंतांची भक्ती ऐसी । रावजी स्वयें उदासी ।
परि पित्राज्ञा मानोनि आदरेंसी । प्रपंचगाडा चालवी ॥ १९ ॥
घेतला प्रपंचभार भाथां । चालवीतसे कार्यापुरता ।
येरवीं प्रिय ज्याचे चित्ता । एकांतवास ॥ २० ॥
सदा विठ्ठलचिंतन । परपीडेचे दुःख जाण ।
शेतीं कष्टोनि आपण । धान्य मेळवी ॥ २१ ॥
स्वयें पाणी आणावें । अन्नही स्वतः शिजवावें ।
खावोनिसुखी असावें कष्ट न देई कोणासी ॥ २२ ॥
जरी गृहीं अर्धांगी । वचनसीमा नुल्लंघी ।
तरी नियमा न त्यागी । आदरिलें ज्या ॥ २३ ॥
येतां नदीस्नान करोनि । स्पर्श करिती उपहासोनि ।
पुनरपि जाई स्नानालागोनि । परि क्रोध शिवेना ॥ २४ ॥
अप्पा पाटील ग्रामस्थ । यांनी केला केला बंदोबस्त ।
परि रावजी भरे न भरित । सात्त्विक धर्ममूर्ती ॥ २५ ॥
ऐसी ठेवोनि वृत्ती । स्वधर्मकर्मी रत होती ।
प्रपंची न जडे आसक्ती । कार्याकारण ॥ २६ ॥
गृहीं दुर्लक्ष झालें । वैभवावरोनि मन उडालें ।
विर्वाहापुरतें राहिलें । स्वल्प कांहीं ॥ २७ ॥
जितुका करावा व्याप । तितुका होतसे संताप ।
साधनीं येई विक्षेप । क्षणोक्षणीं ॥ २८ ॥
विषय लोभ नाही मनीं । वैराग्य वारिलें जयांनीं ।
ऐसे रावजी अंतर्ज्ञानी । जरी लोकीं दिसती साधारण ॥ २९ ॥
विषयीं मानिला वीट । परमार्थीं लागली चट ।
उपासना एकनिष्ठ । निरालस्यें चालवी ॥ ३० ॥
गीताबाई सगुणखाणी । पतिव्रताशिरोमणि ।
सदा तत्पर पतिवचनीं ऽत्यादरें ॥ ३१ ॥
गृहकाजीं दक्ष सदा । वृद्धांसि देई आनंदा ।
सेवेसी नसे मर्यादा । हास्य मुखी ॥ ३२ ॥
अरुणोदयापूर्वीं । उठोनि गृह सारवी ।
रांगोळी घाली बरवी । चित्रविचित्र ॥ ३३ ॥
वेणीफणी सुंदर । कुंकुमादि अलंकार ।
लक्ष्मीपरी साचार । दर्शनें आनंदची ॥ ३४ ॥
देवकाजीं अति सादर । उपकरणीं निर्मळ सुंदर ।
रंगवल्यादि मनोहर । देवगृहा सुशोभवी ॥ ३५ ॥
पुष्पमाळा तुळसीमाळा । गुंफोनि देत वेल्हाळा ।
कामाचा नसे कंटाळा । तियेलागीं ॥ ३६ ॥
गरजेआधी साहित्य पुरवी । मधुरवचनी तोषवी ।
सत्कार्यालागीं झिजवी । देह आपुला ॥ ३७ ॥
नव्हे अंगचोर खादाड । झोळू कुटिल आणि द्वाड ।
ओंगळ तोंडाळ तुसड । कुतर्की हटवादी ॥ ३८ ॥
नव्हे भ्याड ना अति धीट । गृहकार्यें चालवी नीट ।
सासूनणंदांसी बोभाट । कराया ठाव नाहीं ॥ ३९ ॥पति सासू आणि श्वशूर । तुळसी विठ्ठल रखुमाईवर ।
इतुक्यांची सेवा चतुर । नेमस्तपणें चालवी ॥ ४० ॥
वाटे दुजी अनुसूया । अथवा सती जनकतनया ।
पावली भाव पाहूनिया । जगन्माता जगदंबा ॥ ४१ ॥
देवब्घक्तांचे दर्शन । घ्यावया उल्हसित मन ।
उभयतां धरिती चरण । सद्भक्तांचे ॥ ४२ ॥
संभाजी साधु दर्यांत । तेथें उभयतां दर्शना जात ।
चरणीं मस्तक ठेवित । करद्वय जोडोनि ॥ ४३ ॥
त्या साधूंची ऐशी स्थिति । कोणासी स्पर्श करूं न देती ।
लोकीं केली विनंती । यांसीच स्पर्श किंनिमित्त ॥ ४४ ॥
साधु बोलती तयांसी । धन्य असे यांची कुशी ।
उदरीं अवतार देवासी । येणें असे । ४५ ॥
यांचे भाग्य असे थोर । पूर्वसंचित अपरंपार ।
उदरीं होईल अवतार । सगुण ब्रह्म ॥ ४६ ॥
परिसोनि विस्मय करिती । धन्यवाद मुखीं गाती ।
तैसाच रावजीप्रती । दृष्टांत होय एकदिनीं ॥ ४७ ॥
स्वप्नीं येत पंढरीनाथ । कौस्तुभ-श्रीवत्सांकित ।
कंठीं वनमाला शोभत । शंखचक्रधारी ॥ ४८ ॥
कांसे पीतांबर कशिला । मयूरपिच्छें मुगुट शोभला ।
रावजीसन्मुख उभा ठाकला । हास्यमुखें बोलतसे ॥ ४९ ॥
तुझी भक्ती फळा आली । सुकृतें असंख्य जोडलीं ।
भार्या पतिव्रता लाभली । धन्य कुशी तियेची ॥ ५० ॥
तुम्हांसि होईल सुत । महावैष्णव भगवद्भक्त ।
कीर्ति करील दिगंत । सिद्ध पुरुष ॥ ५१ ॥
असंख्य तारील नर । होईल कारणिक अवतार ।
तुमचें भाग्य असे थोर । सद्गतीस पावाल ॥ ५२ ॥
ऐसा दृष्टांत झाला । भार्येसी निवेदन केला ।
उभयतां आनंद झाला । पोटीं न समाये ॥ ५३ ॥
भाग्य आमुचें उदेले । अहा देवा धन्य केलें ।
दीनांसी हातीं धरियेलें । काय भक्ति पाहिली ॥ ५४ ॥
भक्तकाजकल्पद्रुम । म्हणती तुज आत्माराम ।
भक्तांचे हरिसी श्रम । नमन असो आमुचें ॥ ५५ ॥
बहुतां परीनें स्तुती । केली उभयतांनीं चित्तीं ।
कालांतरें गर्भाप्रती । धारण करी गीताई ॥ ५६ ॥
एक मांस होता पूर्ण । पाळी चुकली बाणली खूण ।
आनंदी-आनंदलें मन । सर्वत्रांचें ॥ ५७ ॥
तिजे मासाचे अवसरीं । शिंक्याखालीं बसविती नारी ।
चोरओटी भरोनि सत्वरीं । वायनें देवविती ॥ ५८ ॥
हळूंहळूं डोहाळे लागती । शांति आदरिली चित्तीं ।
प्राकृताऐसे नव्हेती । साधारण वा कष्टमय ॥ ५९ ॥
जैसे लागती डोहाळे । तैसीं निपजती बाळें ।
माता करिती चाळे । त्या त्या परी ॥ ६० ॥
गीताबाईची स्थिति । पहा झाली कैशा रीती ।
जेणें श्रवण तृप्त होती । कथन करूं ॥ ६१ ॥
एकंती जावोनि बैसे । रामनाम घेई हर्षें ।
सात्त्विक आहार करितसे । आवडीनें ॥ ६२ ॥
पतीनें एकांती पुसिलें । काय इच्छा असे बोलें ।
सती वदे इच्छें भ्रमले । तोह्र थोर ॥ ६३ ॥
निर्हेतुक रामभक्ति । करावी वाटते चित्तीं ।
सहजानंदीं वृत्ति । लय करावी ॥ ६४ ॥
सद्गुंरुचरण सेवावे । ऐसें वाटतें जीवेंभावें ।
भविष्य जाणोनि बरवें । रावजी राहे तटस्थ ॥ ६५ ॥
समवयी मैत्रिणी मिळाल्या । कौतुकें भेटों आल्या ।
उपदेशामृतें बोधिल्या । नानापरी ॥ ६६ ॥
कैंचा पुत्र कैंचे घर । कैसे डोहाळे संसार ।
हें सर्वही असार । सार तें वेगळेंचि ॥ ६७ ॥
भगवद्भजन हेंचि सार । नामाचा करा हो गजर ।
परिसोनि विस्मय थोर । वाटे उदरीं सिद्धपुरुष ॥ ६८ ॥
वैभव मानाल सत्य । तरी अऽन्तीं होईल घात ।
मीन गळातें गिळित । आमिषातें भुलोनि ॥ ६९ ॥
तरी ऐसे ं न करावें । सन्मार्ग हृदयीं धरावें ।
सद्गुरूसी शरण जावें । अहंभाव संडोनि ॥ ७० ॥
पतिसेवा निरंतर । करावीं निर्मत्सर ।
जन्मा आलियाचें कीर । सार्थक करावें ॥ ७१ ॥
मैत्रिणींसी उपदेशी । रामनाम अहर्निशी ।
गाई अत्यानंदेंसी । पतिव्रता माऊली ॥ ७२ ॥
ओटीं नारळ घालिती । समारंभ बहु करिती ।
मनींची हौस पुरविती । अतिकौतुकें ॥ ७३ ॥
कोंवळें ऊन्ह चांदणें । काळोखे रात्री जेवणें ।
नानापरींची पक्वान्नें । मधुर आणि धमधमित ॥ ७४ ॥
वनभोजन वांवळीभोजन । तुळशीभोजन केळीभोजन ।
सुवासिनी कुमारिका जमवून । ओटीभरण करिताती ॥ ७५ ॥
याचकांसी दिधलें धन । सुवासिनींसी वायन ।
महाफळें आणि खण । धान्य देऊन बोळविती ॥ ७६ ॥
उत्तरोत्तर वाढे गर्भ । तेज फांकलें स्वयंभ ।
होईल म्हणती पुत्रलाभ । कुलदीप चालवील ॥ ७७ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते द्वितीयाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय दुसरा
समास तिसरा

श्रीगणाधीशा तुज नमोन । करितो श्रीगुरूंचे जन्मकथन ।
मज दीनावरी कृपा करून । अवधान दीजे ॥ १ ॥
हळूं हळूं दिवस भरले । नवमास पूर्ण झाले ।
सोहळे सर्वही केले । शास्त्ररूढी ॥ २ ॥
प्रसूतीसाहित्य जमा केलें । कुशल सुइणीसी निमंत्रिलें ।
प्रसूतीगृह रंगविलें । शोभायमान ॥ ३ ॥
जन्मसमय प्राप्त झाला । कोणी करूं नका गलबला ।
मुखानें राम राम बोला । सुटका होईल त्वरित ॥ ४ ॥
शके सतराशें साहसष्टांत । माघ शुद्ध द्वादशीप्रत ।
बुधे पंचघटी प्रभात । मीन लग्नीं रवि आला ॥ ५ ॥
शुभदिन शुभमुहुर्त । उच्च ग्रह असती जेथ ।
तया लग्नीं बाल जन्मत । आनंदा सुकाळ जाहला ॥ ६ ॥
इकडे भजनाचा गजर । रावजी करितसे मनोहर ।
पुत्रवार्ता सांगाया चतुर । नारी टपोनि बैसल्या ॥ ७ ॥
उदरीं प्रसूतिवेदना आली । गीताबाई प्रसूत जाहली ।
पूर्वपुण्यें सुपुत्र लाधली । सिद्धपुरुष ॥ ८ ॥
चतुर नारी धांवत गेली । पुत्रवार्ता निवेदिली ।
द्रव्य देऊनि सुखी केली । लिंगोपंत – रावजींनी ॥ ९ ॥
पुत्र होय रावजीप्रती । घरोघरें शर्करा वांटिती ।
नरनारी पाहों येती । बालकासी कौतुकें ॥ १० ॥
ज्योतिष्यासी बोलाविलें । सूक्ष्मवेळेसी कथिलें ।
भविष्य पाहिजे वर्तविले । गणित करोनी ॥ ११ ॥
वेदमूर्ती पाचारिल्या । दक्षिणा देऊनि सुखी केल्या ।
याचकमांदी धांविन्नल्या । रावजीगृहीं ॥ १२ ॥
कोणा वस्त्र कोणा भूषण । कोणा धान्य कोणा अन्न ।
देऊनि तोषविती मन । सकळिकांचें ॥ १३ ॥
आंधळ्या पांगळ्या व्यंगांसी । भोजन घालिती हर्षेंसी ।
तृप्त होविनि सुखेंसी । आशीर्वचनें बोलती ॥ १४ ॥
खण नारळ सुवासिनी । हळद कुंकू लेववोनी ।
ओट्या भरिती धान्यांनी । बहुतां परींच्या ॥ १५ ॥
गांवोगांवी धाडिलें पत्र । ईशकृपें लाधलों पुत्र ।
सुखी असती सर्वत्र । चिंता चित्तीं नसावी ॥ १६ ॥
तुझे कृपें जाहला पुत्र । म्हणोनि करिती स्तोत्र ।
पांडुरंगा तूंचि मित्र । पाठिराखा आमुचा ॥ १७ ॥
मातुलगृही पाठविती । शर्करा दूताहातीं ।
पत्र देवोनि कथिती । आनंदवार्ता ॥ १८ ॥
वेदोक्त कर्में शांत्यादिक । यथाविधि करिती सकौतुक ।
पुत्रस्नेह उन्नत देख । दिवसेंदिवस होतसे ॥ १९ ॥
न्हाणीपूजन पांचवीपूजन । नाना ग्रहांचे पूजन ।
लोकाचारें करिती जाण । अंतरीं ध्यान पांडुरंग ॥ २० ॥
दश दिन समाप्त झाले । सूतिकागृह शुद्ध केले ।
घरोघरी वाटले । विडे आणि सुंठवडे ॥ २१ ॥
त्रयोदश दिन प्राप्त झाला । समारंभ आरंभिला ।
करूं म्हणती नामकरणाला । अतिप्रीतीं ॥ २२ ॥
पाहुणेमंडळी जमली । गृहीं अत्यंत दाटी झाली ।
बालकांची गट्टी जमली । करिती सारा गोंगाट ॥ २३ ॥पक्वान्नें केलीं षड्रस । विप्र सुवासिनी विशेष ।
कुमार कुमारी आणि दास । जेवूं घालिती अनेकां ॥ २४ ॥
बाळ आणि बाळंतिणी । सुगंधिक तैलें उटणीं ।
न्हाऊं घालिती मर्दोनी । शीघ्रत्वेंसी ॥ २५ ॥
दृष्ट होईल म्हणती । मीठमोहर्या ओंवाळिती ।
मिरच्या पावकीं घालिती । कितीएक ॥ २६ ॥
नेत्री घालिती काजळा । तीट लाविती कपाळा ।
वारा लागों न देती बाळा । शीत होईल म्हणोनि ॥ २७ ॥
अन्न वांटिती गरिबांसी । लुगडें चोळी सुईणीसी ।
देती अतिहर्षेंसी । कार्यभाग चालिला ॥ २८ ॥
रावजी मनीं विचारी । स्वप्नीं बोलिले श्रीहरी ।
सिद्धपुरुष हा निर्धारीं । धन्य भाग्य आमुचें ॥ २९ ॥
अनंत जन्मींची सुकृतें । फळली आजिं आम्हांतें ।
उद्धार करील कुळातें । निश्चयेंसी ॥ ३० ॥
सत्कर्मी पुत्र होय जरी । पितरा नरकापासोनि तारी ।
आत्मज्ञानी झालियावरी । सुकृतातें न गणवे ॥ ३१ ॥
कुकर्मी झालिया पुत्र । नरकीं घालील सर्वत्र ।
म्हणोनि सुज्ञ सुपुत्र । वांछिती सद्गतीसी ॥ ३२ ॥
कोणी घेतील आशंका । कर्म एकाचे एका ।
फळतें कैसें सांगाना कां । आम्हांप्रती ॥ ३३ ॥
वाटसरू वृक्षछायेंसी । क्षण एक आले वस्तीसी ।
सवेंचि चालिले दशदेशीं । येरयेरां काय प्राप्त ॥ ३४ ॥
येचि दृष्टांतीं विवेचन । करूं व्हावें सावधान ।
एकाचें कर्म एकालागून । भोंवतें कीं नाहीं ॥ ३५ ॥
कोणे एके धर्मशाळे । पांथिक समुदाय जमले ।
संगतिपरिणाम लाधले । कैसे पहा ॥ ३६ ॥
कोणाचा कर्ण फुटला । दुर्गंधवायु कोंदला ।
कोणी करी वमनाला । चिळस आली ॥ ३७ ॥
कोणी ढेंकूण आणिती । वस्त्रांतून उवा निघती ।
ढांसढांसोनि जागविती । समस्तांसी कितीएक ॥ ३८ ॥
पीडिती ऐसे अधम । आतां पाहूं ते उत्तम ।
ज्यांची संगती आराम । इतरां देई ॥ ३९ ॥
कोणी हरिभजन करिती । श्रवणीं पीयुष सिंचिती ।
कोणी मधुर गायन करिती । आनंदविती सकळांसी ॥ ४० ॥
अत्तरें माखिती कोणी । दीप ठेविती लावोनी ।
देशोदेशींचें ज्ञान कथुनी । चित्तरंजन करिताती ॥ ४१ ॥
असो ऐसे बहुत जन । गुंतले पाहोनि आश्रयस्थान ।
सुखदुःख भोगिती जाण । संगतीसारिखें ॥ ४२ ॥
तैसे कुळाभिमानी गुंतले । पुत्रस्नेहें जे भ्रमले ।
त्यांसी पाहिजे भोगिले । पुत्रकर्म ॥ ४३ ॥
पुत्रावांचोनि नाही गति । ऐसें सर्वत्र बोलती ।
स्वर्गद्वारीं न घेती । निपुत्रिकासी ॥ ४४ ॥
आणि पितृऋणांतुनी । सुत होतां मुक्त प्राणी ।
पितरोद्देशें देई पाणी । आत्मा मूर्तिमंत दुसरा ॥ ४५ ॥
करोनि बहु विचार । रावजी आनंदले थोर ।
आठविती देवाचे उपकार । स्तविती पुन्हा पुन्हा ॥ ४६ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते द्वितीयाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय दुसरा
समास चवथा

जयजय श्रीबालकृष्णा । तुझिये कृपें निरसे तृष्णा ।
शरण जाणूनि करिं करुणा । विनंती माझी ॥ १ ॥
बालरूप गुरुवर । दिवसेंदिवस होती थोर ।
कराया पतितांचा उद्धार । नररूप धरियेलें ॥ २ ॥
आला बारशाचा दिवस । आनंदले बहुवस ।
पाचारिलें सोनारास । कानीं मुद्या घालिती ॥ ३ ॥
ताशा मरफा आणि सूर । ढोल सनई सुस्वर ।
शिंगें वाजविती चतुर । वाजंत्री अनेक ॥ ४ ॥
बाळासि भूषणें घालिती । पंचधातूंचे वाळे करिती ।
वाघनखें सुवर्णीं गुंफिती । गाठलें घालिती पुतळ्यांचें ॥ ५ ॥
कंठी सुवर्णसांखळी । बिंदली मनगटी हसोळी ।
आंगठ्या घालिती । करांगुलीं । रणजोडवें पायांत ॥ ६ ॥
उर्णावस्त्राचें अंगडें । गजनीचें करिती टोपडें ।
जरीकुंचीसी गोंडें । कनकपुष्पें लाविती ॥ ७ ॥
सुवासिनी बहुत जमल्या । खण नारळ कुंच्या आणिल्या ।
कोणी वाळे कोणी बिंदल्या । आणिती यथाशक्ती ॥ ८ ॥
पाळणा सुंदर रंगविला । खेळणीं लाविलीं जयाला ।
घालिती मऊ शय्येला । दुपटीं रंगीत चिटांची ॥ ९ ॥
बाळासी पोटकुळीं धरिती । पाळण्याखालूनि देती ।
गोविंद गोपाळ घ्याहो म्हणती । हर्षभरें ॥ १० ॥
दर्शन उद्वेग चिंता हरी । वाटे दुजा सिंदुरारी ।
गणेश नाम ठेविती नारी । सद्गुरूंचें ॥ ११ ॥
सुंठवडा वांटला सत्वर । घुगर्या पेढे साखर ।
गणेश नामाचा गजर । नरनारी करिताती ॥ १२ ॥
हळद कुंकू ओटी । परस्परें करिती दाटीं ।
वायनें दानें दिधलीं मोठीं । अपूर्व सोहळा जाहला ॥ १३ ॥
गणपतीचें मुख पाहती । सुहास्यवदन गंभीरवृत्ती ।
दर्शनें आनंद चित्तीं । न समाये ॥ १४ ॥
पहा हो सोज्ज्वळ बाळ । नसे श्लेष्म आणि लाळ ।
न करी रडोनि गोंधळ । योगियापरी स्थिरदृष्टी ॥ १५ ॥
ब्रह्मरंध्री वायु खेळे । दशमद्वार तें मोकळें ।
सहजानंदाचे सोहळे । नित्य भोगी ॥ १६ ॥
नवल वाटलें सकळांसी । अवतरले ज्ञानराशी ।
धन्य धन्य तुमची कुशी । धन्य तुमचें दर्शन ॥ १७ ॥
हर्षें कोंदलें गगन । सोहळा झाला पूर्ण ।
ज्योतिषी तेथें येवोन । जातकातें वर्तविती ॥ १८ ॥
मीनलग्नीं जन्म यासी । कुंडली परिसावी कैसी ।
स्वगृहीं तनुस्थानासी । बृहस्पति देवगुरु ॥ १९ ॥
वृषभे केतु सहजांत । कर्के स्वगृही निशिनाथ ।
वृश्चिके शोभे धरणीसुत । राहु संगें घेवोनी ॥ २० ॥
नक्रे बुध शुक्र शनि । अत्युत्तम एकादशस्थानी ।
कुंभे द्वादशीं तरणि । शुभदायक सर्व ग्रह ॥ २१ ॥
होईल हा भगवद्भक्त । भगवद्भजनी आसक्त ।
तुम्हांसी न कामा येत । प्रपंचाच्या ॥ २२ ॥
घराचें करील देऊळ । मिळवील बालगोपाळ ।
नांदवील सज्जन आणि खळ । एके ठायीं ॥ २३ ॥
लक्ष्मी नांदेल याचे घरीं । परि हा नित्य भिकारी ।
दीनजनांचा कैवारी । होईल सदा ॥ २४ ॥
विद्या पाहतां अगणित । गणितें न गणवे नेमस्त ।
ब्रह्मज्ञानी होईल सत्य । ऐसें आम्हां वाटतें ॥ २५ ॥
भार्या पुत्र आणि धन । यांवरी नसे आसक्त मन ।
स्वस्वरूपीं अनुसंधान । ठेवील निश्चयेंसी ॥ २६ ॥
शमवील अंतःशत्रूसी । बाह्य शत्रु नसे यासी ।
सदा प्रेमळ वाग्विलासी । अनंत शरण येतील ॥ २७ ॥
उभय कुळें उद्धरील । अनन्यांसी तारील ।
कीर्ति डंका वाजवील । त्रिभुवनीं ॥ २८ ॥
उपाध्ये जातक वर्तविती । तयां दक्षिणा देऊनि बोळविती ।
अंगारे धुपारे करिती । दृष्ट होईल म्हणोनी ॥ २९ ॥
पाळण्या बाळ निजवोनि । पाळणे गाई जो जो म्हणोनि ।
दोरी हलवी गुरुजननी । मुख चुंबी क्षणाक्षणा ॥ ३० ॥
पुत्रप्रेम न वर्णवे । माय होवोनि जाणावें ।
येरीं शब्दें वर्णावें । स्वल्प कांही ॥ ३१ ॥
पुत्र जरी असला काळा । रोगग्रस्त अंधळा पांगळा ।
तरी मायेचा जिव्हाळा । वेगळाचि ॥ ३२ ॥
त्यावरी असला सद्गुणीं । सशक्त गोंडस गौरवर्णी ।
मग तें प्रेम कोण वानी । माउलीचें ॥ ३३ ॥दिवसेंदिवस बाळलीला । पाहूनि प्रेमाचा उमाळा ।
आठविती घनसांवळा । तव कृपें लाधलों ॥ ३४ ॥
आज बाळ उपडें वळलें । मान सावरूं लागलें ।
माणूस न्याहाळी वहिलें । स्थिरदृष्टी ॥ ३५ ॥
पाहा हो रांगत गेला । टिकों नेदी वस्तूला ।
कोणी आवरावें याला । चपळ भारी ॥ ३६ ॥
आजोबांची अति प्रीति । कडिये घेवोनि फिरती ।
नाना वस्तूंसी दाविती । हास्य करी विनोदें ॥ ३७ ॥
प्रसंगें रडों लागला जरी । म्हणतां रामकृष्ण विठ्ठल हरी ।
उगा राहोनि श्रवण करी । अत्यंत आवडी भजनाची ॥ ३८ ॥
सर्वांपाशी जात आहे । म्हणती जगमित्र दिसताहे ।
तुसडा आपमतलबी नोहे । जनप्रियत्व करील ॥ ३९ ॥
करांगुली घाली मुखांत । गाई पाळील हा बहुत ।
देउळीं सदा खेळत । देवभक्त होईल ॥ ४० ॥
बालका सन्निध राहती । क्षण एक न विसंबती ।
संगतीसुखासी मिती । नाहीं नाहीं ॥ ४१ ॥
पिता पाहतां विरक्त । परि पुत्रदर्शनीं आसक्त ।
म्हणे शांत होतें चित्त । दर्शनें याच्या ॥ ४२ ॥
आधीं बालस्नेह परम । त्याहीवरी सत्समागम ।
संगतीसुख निरुपम । वाटे सकळांसी ॥ ४३ ॥
गणपती बोबडें बोले । सकळां कौतुक वाटलें ।
आपणही तैसे चाळे । करिती त्यासवें ॥ ४४ ॥
जमले गुरुभक्त गुरुलीलाश्रोते । जे बोधामृताचे भोक्ते ।
कथन केलें व्यवहारातें । म्हणतील जरी ॥ ४५ ॥
गुरुलीला बोधयुक्त । कथन करावी त्वरित ।
जेणें श्रवण होती पुनीत । श्रोतयांचे ॥ ४६ ॥
वक्ता बोले जी प्रमाण । प्रसंगें वर्तलें जें जाण ।
केलें पाहिजे कथन । यथारीती ॥ ४७ ॥
राजभेटीची आवडी । परि दूत आडवी देवडीं ।
तिष्ठावें लागतें घडिघडी । हां जी हां जी म्हणोनी ॥ ४८ ॥
मधुर भोजनाचे भोक्ते । परि मिठावांचूनि अडतें ।
म्हणती असावें रायतें । चवीलागीं ॥ ४९ ॥
श्रवणीं बैसले सज्जन । गुरुलीला परम गहन ।
यथाशक्ति विवरण । केलेंचि करूं ॥ ५० ॥
रंगीबेरंगी खेळणी देती । टाळी घंटा वाजविती ।
बागुल आला कोणी म्हणती । भिती दाविती ज्ञानिया ॥ ५१ ॥
माहेरीं गीताईसी । नेती, पाहती बाळासी ।
आजा आजी संतुष्ट मानसीं । आत्यंतिक जाहलीं ॥ ५२ ॥
उष्टावणाचा सोहळा । करी आनंदें मावळा ।
अलंकार घालिती बाळा । पुरविती हौस ॥ ५३ ॥
बाळ उभा राहिला । त्यासी पांगुळगाडा केला ।
अडखळत चालूं लागला । धांवे गुरांसन्निध ॥ ५४ ॥
इकडे लिंगोपंत रावजीसी । न गमे अहर्निशीं ।
दूताहातें गीताईसी । आणविलें त्वरित ॥ ५५ ॥
असो ऐसी गुरुमाउली । दीनजनांची साउली ।
भक्तांलागीं पावली । मनुष्यरूपें ॥ ५६ ॥
रावजी वैराग्यें उदासी । वाटे शिव श्मशानवासी ।
गीता ज्ञानी सद्गुणेंसी । उमा प्रत्यक्ष वाटत ॥ ५७ ॥
कलिमलासुर मातला । बद्धमुमुक्षां अजिंक्य जाहला ।
म्हणोनि अवतार घेतला । गणपतीनें ॥ ५८ ॥
भवरोगें जन व्यापिले । कृतांतमुखीं चालले ।
चतुर वैद्य पाठविले । श्रीरामरायें ॥ ५९ ॥
परमार्थधामीं निघाले । मार्गीं चोरटे भेटले ।
विपरीत कथोनि भ्रमविले । भलतीकडे ॥ ६० ॥
तैं आले रामदूत । ठकां पिटाळूनि लावित ।
शुद्धमार्गें चालवीत । मार्गस्थांसी ॥ ६१ ॥
माणदेशींचे लोक । भोळे वदती बहुतेक ।
परि सद्गुरूंनी निःशंक । योग्यतेसी दाविलें ॥ ६२ ॥
धन्य कुळ धन्य ग्राम । धन्य देश पावन परम ।
धन्य भक्त पुरुषोत्तम । सद्गु रुभेटी लाधले ॥ ६३ ॥
ज्ञानसूर्य उगवला । हळूं हळूं प्रकाश फांकला ।
साधकां आधार मिळाला । आदर्शभूत ॥ ६४ ॥
पुढील चरित्राची गोडी । चाखावी अति आवडी ।
मनाची मोडोनियां उडी । श्रवणीं सादर बैसवावें ॥ ६५ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते द्वितीयाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय तिसरा
समास पहिला

न लिंपे कदा बालक्रिडा‍उपाधी । विवेकें सदा ज्ञान वैराग्य साधी ॥
जया सद्‌गुरूभेटिची होय स्फूर्ति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ३ ॥

ॐ नमो जी गुरुमूर्ति । स्वयंसिद्ध ज्ञानज्योति ।
त्रिभुवनीं चमके दीप्ति । चैतन्यरूप ॥ १ ॥
अंतर्बाह्य व्यापूनि असे । परि चर्मचक्षूतें न दिसे ।
दिसे म्हणतांचि पिसें । साक्षित्वें होय ॥ २ ॥
तुझे प्रकाशाचा विलास । निरसी अष्टधेचा भास ।
द्रष्टा आणि दृश्य यांस । स्वतेजीं मेळवी ॥ ३ ॥
प्रकाश आणि दीप । भिन्न ठाव नसे अल्प ।
करितां ध्यानाचा संकल्प । ध्येय ध्याता नुरेचि ॥ ४ ॥
स्वयंप्रकाश परंज्योति । तेजीं सहस्र सूर्य लपती ।
उष्ण शीत विकारस्थिति । मुळीं नाही ॥ ५ ॥
परप्रकाशें पाहो जातां । प्रकाश फिरे मागुता ।
तेथें दुज्याची सत्ता । अल्पही न चले ॥ ६ ॥
तुझ्या स्वरूपाची कोटी । अनंत ब्रह्मांडें सांठवी पोटीं ।
परि भक्त हृदयसंपुष्टीं । घालोनि पूजिती ॥ ७ ॥
तव तेजासी आडवी । ऐसा नसे गोसावी ।
दुजेपणाची यादवी । नाही तेथें ॥ ८ ॥
ज्योत चालली अढळ । नसे मैस ना काजळ ।
वायूचा आधार जोंजाळ । अणुभरी असेना ॥ ९ ॥
तूं होवोनि तुज पाहावें । भावभक्तीनें जाणावें ।
एरवीं ते व्यर्थ गोवे । सद्‍गुरुपद भेटेना ॥ १० ॥
कोणी पाजळी ना विझवी । आदिमध्यान्त ना बरवी ।
अखंड चालली सतरावी । स्नेहेंविण ॥ ११ ॥
मायामोहाचे दर्पणीं । बिंब राहोनि बिंबोनि ।
सवेंचि वाढली दोनी । गंधर्वनगरें ॥ १२ ॥
जड चंचल माया । चैतन्य जाणीव बिंबकाया ।
अधिष्ठानासारिखे जया । विकार दिसती ॥ १३ ॥
परि ते विकारवंत नोहे । मुळीं असिजे तैसेंचि आहे ।
जरी भिन्न भासताहे । अज्ञानियां ॥ १४ ॥
अज्ञान निरसिल्यावरी । बाह्य आणि अभ्यंतरी ।
एकचि रूप निर्धारी । ज्ञानज्योति ॥ १५ ॥
प्रकृतीचा संग घडला । सगुणत्वाचा आळ आला ।
परि म्हणोनीचि लाधला । स्तुति-सेवा कराया ॥ १६ ॥
विशेष जाणिवेचें स्थान । तेंचि सद्गुरूचें अधिष्ठान ।
ऐसें बोलती सज्जन । ठायीं ठायीं ॥ १७ ॥
तीच जाणीव ज्ञानज्योति । सद्‍गुरु ब्रह्मचैतन्यमूर्ति ।
गोंदवलेग्रामीं आम्हांप्रती । भेटली थोर भाग्यें ॥ १८ ॥
निर्गुण सगुणत्वा आलें । आंधळ्यांनींही देखिलें ।
कांहीं जे डोळस झाले । अंतर्बाह्य पाहती ॥ १९ ॥
पाहतां पाहणें विरालें । गुरुरूप होऊनि ठेलें ।
जन्ममरण फेरे चुकले । धन्य पुरुष ॥ २० ॥
गुरुबोधांजन घेतलिया । आंधळेपण जाय विलया ।
द्रष्टेपणही वांया । होऊनि जाय ॥ २१ ॥
सगुणीं सगुण भजावें । चित्तशुद्धीतें पावावें ।
ज्ञानदृष्टीनें पाहावें । सद्गुरूसी ॥ २२ ॥
भोळें भाविक आंधळे जन । यांसी उपासनेलागोन ।
ज्ञानज्योति झाली सगुण । मनुष्यरूपीं ॥ २३ ॥
आमुचे घरा पाहुणी आली । आम्हांसारिखी वागली ।
वागली परि राहिली । वेगळीच ती ॥ २४ ॥
जैसें सोनपितळ आणि सोने । सगट दिसती दागिने ।
शहाणा तो पारखूं जाणे । खरें खोटें कोणते ॥ २५ ॥
मृत्तिका आणि कस्तुरी । मानूं नये एकसरी ।
कस्तुरी कोंदे अंबरीं । सुगंधयुक्त ॥ २६ ॥
गृहीं लाविलिया दीप । जीवजंतू धांवती अमूप ।
फिरफिरोनि घालिती झांप । पोटधंदा सोडोनी ॥ २७ ॥
तैसी ही ज्ञानज्योति । भोंवतीं असंख्य जीव जमती ।
झडपणीं तदाकार होती । संसृतीतें सोडोनि ॥ २८ ॥
रजनीं दृश्य दीप दावी । अज्ञानिया सद्‍गुरुगोसावी ।
ज्ञानतेजें समूळ घालवी । तिमिरराशी ॥ २९ ॥
तिमिर गेलियापाठीं । लोभमोहादि चोरटी ।
न येती समोर दृष्टी । साधकांते नाडाया ॥ ३० ॥
निर्गुण गुणत्वा आलें । गुणसाम्यें वर्णन केलें ।
नातरी वर्णितां भागले । थोरथोर ॥ ३१ ॥
सिद्ध होवोनि सिद्ध पहावे । जाणते होवोनि जाणावें ।
शब्दज्ञानें पडेना ठावें । सद्‍गुरुरूप ॥ ३२ ॥
अनुभवी ना व्युत्पन्न । परि स्तवनीं गुंतले मन ।
आवडीसारिखें सजवोन । निववूं चित्त ॥ ३३ ॥सूर्या दाविती नीरांजन । ऐसें भक्तीचे लक्षण ।
तैसेंचि ज्ञाननिधान । वर्णूं आतां ॥ ३४ ॥
आवडीसारिखें सजवूं । ज्ञानेंद्रियांची साक्ष घेऊं ।
अंतरीं सद्गुरूचें पद ध्याऊं । निरंतर प्रेमभरें ॥ ३५ ॥
चला गोंदवलें ग्रामासी । रावजीगृहीं सत्वरेंसी ।
बाळलीला आहे कैसी । पाहूं नेत्र भरोनि ॥ ३६ ॥
एक वर्ष झालें बाळा । वाढदिवसाचा सोहळा ।
आनंदें यथासांग झाला । रावजीगृहीं ॥ ३७ ॥
गणपती बोबडें बोले । ऐकतां श्रवण संतोषले ।
उचलोनी कडिये घेतले । ज्यांनी त्यांनी ॥ ३८ ॥
राहेना माउलीघरीं । घेऊनि जाती शेजारी ।
खेळूं लागती नानापरी । त्यासवेंचि ॥ ३९ ॥
जया आपपरभाव नाही । जिकडे नेती तिकडे जाई ।
मुख न्याहाळिना कांही । आपुलें कीं परावें ॥ ४० ॥
सर्वत्रांसी वाटे घ्यावे । वाटणी येईना स्वभावें ।
ज्यानें पहावें त्यानें न्यावे । आपुले गृही ॥ ४१ ॥
तेथेंचि जेवूं घालावें । मऊ शय्येवरी निजवावें ।
पुन्हा माउलीसी पुसावें । बाळ कोठें म्हणोनि ॥ ४२ ॥
मूल पाहतां पडे भूल । वरी गोजिरें आणि सोज्ज्वळ ।
हास्यमुख आणि प्रेमळ । मग काय उणें ॥ ४३ ॥
जरी ओंगळ आणि तुसड । जागचें हलेना जड ।
रडतमुखी खादाड । अतिशयेंचि ॥ ४४ ॥
हटवादी आणि त्रागी । पाय शिर आपटी वेगीं ।
जे सदा असे रोगी । कांही ना कांहीं ॥ ४५ ॥
नकटें काळें कुळकुळीत । मधुरसेवनीं अतृप्त ।
विधि वमन करीत । चिळसवाणें ॥ ४६ ॥
माउलीसी सोडीना । कामकाज करूं देईना ।
म्हणती फेडोन घेतो नाना । उपकार पूर्वजन्मींचे ॥ ४७ ॥
तयासी कोणी न घेती । प्रसंग आल्या कंटाळती ।
वदती ‘ऐसीं कां जन्मतीं । दुःख द्यावयाकारणें ?’ ॥ ४८ ॥
मस्तकी उवा आणि खवडे । खरूज नायेटे पैण चिपडें ।
झांपड होऊनी सदा रडे । वैरी म्हणती पूर्वींचें ॥ ४९ ॥
तैसा नव्हे गणपती । दर्शनें आनंद होय चित्तीं ।
प्रेमें उचलोनि घेती । करिती हास्यविनोद ॥ ५० ॥
रावजीगृहीं प्रतिदिन । होत असे कीर्तन भजन ।
गणपति चित्त देऊन । श्रवण करी स्थिरत्वें ॥ ५१ ॥
माउलीसन्निध निजेना । निजवितां रडतां राहेना ।
भजनाची आवडी मना । तेथें खेळे स्वच्छंदें ॥ ५२ ॥
म्हणती तुज समजते काय । बालपणीं प्रिय माय ।
खेळखेळोनि दिवस जाय । बालकांचा ॥ ५३ ॥
आजा पोथी वाची नित्य । श्रवणा जावोनि बैसत ।
म्हणती पहा हो याचें चित्त । श्रवणीं स्थिर होतसे ॥ ५४ ॥
अशा वयीं क्रीडेची गोडी । गोड खावयाची आवडी ।
मौज पाहावया घेती उडी । पोरांसवें धांवती ॥ ५५ ॥
यासी दिधल्या खाईना ॥ क्रीडेचा हट्ट धरीना ।
श्रवणा बैसतो पहाना । चित्त देऊनी ॥ ५६ ॥
याची बुद्धी दिसते भारी । सांगितली गोष्ट न विसरी ।
याचेपाशी फसवेगिरी । कांहीं चालेना ॥ ५७ ॥
हळूं हळूं दिवस गेले । तीन संवत्सर पालटले ।
बुद्धि देखोनि चकित झाले । म्हणती कोणा न बोलावें ॥ ५८ ॥
कोणी ठेवितील नांवें । कोणी स्तुति करितील भावें ।
दृष्ट होईल स्वभावें । बालकासी ॥ ५९ ॥
धुळीं अक्षरें घालोन देती । तैसींच काढी शीघ्रगती ।
लिहिण्यावाचण्या गणपती । शिकला त्वरित ॥ ६० ॥
दंतकथा होते सांगत । एकपाठी दुपाठी पंडित ।
भोजसभेसीं नांदत । कालिदासादिक ॥ ६१ ॥
दंतकथा म्हणतां खोटी । करूनि दावितो गोष्टी ।
नवल पहा एकपाठी । पूर्वार्जित ज्ञान ॥ ६२ ॥
पूर्वजन्मीं हा साधु । असेल कोणी प्रसिद्धु ।
वासनाशेषें जन्मसंबंधु । घडला असेल ॥ ६३ ॥
नानापरीनें कल्पना । करिती तर्क वितर्क नाना ।
दृष्टांत आणोनि ध्याना । स्वस्थ राहती ॥ ६४ ॥
चपलत्वें वाटे हूड । परि हूड ना द्वाड ।
पराव्याची न काढी खोड । मैत्री राखे सर्वदा ॥ ६५ ॥
नित्य हरिभजनीं नाचे । रामनाम घेई वाचे ।
बालपणीं आयुष्य न वेंचे । क्रीडेमाजीं ॥ ६६ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते तृतीयाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय तिसरा
समास दुसरा

एकदां वृद्ध लिंगोपंत । नातवासी पाचारित ।
म्हणती ‘ऐक रे मात । विचारितों सांग पां ॥ १ ॥
तुजसी एक हंडाभरी । मोहरा दिधल्या जरी ।
तरी काय करिसी सत्वरें । सांग मज’ ॥ २ ॥
‘वांटोन टाकीन समस्त । अंध पंगु रोगग्रस्त ।
गोरगरीब अनाथ । भिकार्यांसी’ ॥ ३ ॥
ऐसें देतां प्रत्युत्तर । आजा संतोषला थोर ।
म्हणे करील परोपकार । दुःखभार हरील ॥ ४ ॥
लिंगोपंत सुसंस्कृत । म्हणोनि ऐसें बोलत ।
उधळ्या म्हणतील समस्त । प्राकृत जन ॥ ५ ॥
बहुतेक मुलांची जात । हातींचे कोणा न देत ।
दुसर्यांचे घेऊं पहात । लोभमोहें ॥ ६ ॥
ऐसी नव्हे सात्विक जाति । परदुःखें दुखावती ।
परसुखें संतोष चित्तीं । होतसे तयासी ॥ ७ ॥
पुनरपि म्हणे आजा । ‘तुज केलिया राजा ।
काय करिसी कुलध्वजा । सांग बापा’ ॥ ८ ॥
येरू वदे झडकरी । ‘न ठेवीन देशीं भिकारी ।
अन्नछत्र राजद्वारीं । ठेवीन नित्य’ ॥ ९ ॥
सहज विनोदें पुसिलें । मुलाने प्रत्युत्तर दिलें ।
ऐकोनी अश्रु आले । नयनी श्रोतयाच्या ॥ १० ॥
पंचवर्षांचे बालक । पाहा हो याचें कौतुक ।
सात्विक ज्ञान निःशंक । झाले यासी ॥ ११ ॥
न म्हणे गेईन घोडा । खोपट काढोनि बांधीन वाडा ।
उंची वस्त्रें रथ गाडा । दासदासी दागिने ॥ १२ ॥
विषयभोग वांछिना । भूतदयेहोनि बोलेना ।
वैराग्य कैसें पाहा ना । विवेकेंसहित ॥ १३ ॥
वयें दिसती सान । परि जोडलें निधान ।
उपजत लाधलें ज्ञान । सत्य सत्य ॥ १४ ॥
तपाच्या करितां कोडी । न सुटे मोह-लोभ-बेडी ।
भलीं भलीं जाहली वेडी । यांजसाठी ॥ १५ ॥
क्रियेंवाचून वटवट । घरोघरीं बोलती पोपट ।
उभयकर्मीं वर्ते नीट । ऐसा विरळा ॥ १६ ॥
अनंत जन्मांचिया पोटीं । विषयाची झाली भेटी ।
सोडितां न सुटे गांठी । देहकाष्ठें केलिया ॥ १७ ॥
या कलियुगामाझारीं । वेदांत भरला घरोघरीं ।
आचार पाहतां अणुभरी । शुद्ध नाही ॥ १८ ॥
आम्हां वृद्धांस लाजवी । ऐसी क्रिया करून दावी ।
प्रौढपणीं घेईल पदवी । सायुज्याची ॥ १९ ॥
देहासी वृद्धपण आलें । लोभ मोह तैसेचि ठेले ।
चिंतेने चित्त भ्रमलें । असे नित्य आमुचें ॥ २० ॥
यासी बाळ म्हणों नये । बुद्धीनें हा वडील होये ।
भक्तियुक्त नाम गाये । राम राम म्हणोनी ॥ २१ ॥
आमुचे घरी कुलदैवत । पंढरीनाथ नेमस्त ।
परि हा दिसे रामभक्त । पूर्वसंस्कारें ॥ २२ ॥
जन्मार्जित तप केलें । अथवा रामदूत अवतरले ।
उपजत ज्ञान कैसें आलें । याजपासी ॥ २३ ॥
पहा हो याचा आचार । उषःकाली उठे सत्वर ।
चूळ भरावया नीर । त्वरित आणी ॥ २४ ॥
म्हणे म्हणा हो श्रीहरी । आरती भूपाळी सत्वरी ।
श्रवण करोनि चरण चुरी । दक्षता कैसी पाहावी ॥ २५ ॥
असो तदनंतर । माउलीसन्निध जाय कुमर ।
गोड बोलोनि तोष थोर । देतसे तिजलागीं ॥ २६ ॥
बोलिलें वचन नुल्लंघी । आळसा न देई अंगी ।
वाटे हा बालयोगी । पावला गृहीं ॥ २७ ॥
तुळशी आणवयास धांवे । म्हणे देवपूजन करावें ।
धूपदीप लावा बरवे । दाखवा नैवेद्य ॥ २८ ॥
गीतेचा नित्य पाठ धरीं । चित्त देवोनि श्रवण करी ।
अंतरीं अर्थ विवरी । बाह्य धरी मौनत्व ॥ २९ ॥
निमूटपणें भोजनीं बैसे । गोड-तिखटाची हांव नसे ।
घालिती ते खात असे । आसक्तिरहित ॥ ३० ॥
खेळावयासी नेमस्त । जाई सवंगड्यांसमवेत ।
खोडी कुचाळी न काढित । सदा प्रेम सकळांसी ॥ ३१ ॥
सर्वांसी वाटे हा हवा । याचेसंगें खेळ बरवा ।
नित्य नवा खेळावा । सुखदायक ॥ ३२ ॥
सायंकाळी स्तोत्रें बरवी । मधुरवाणी म्हणोनि दावी ।
भजनीं आवडी नित्य नवी । असे जया ॥ ३३ ॥
भजन झालियावांचोनि । न जाई जो शयनीं ।
सत्कर्मीं निशिदिनीं । काळ करी सार्थक ॥ ३४ ॥
बाळपणीं साधकवृत्ति । अंगीकारिली ज्यांनीं चित्तीं ।
तयां वर्णितां मति । कुंठित झाली ॥ ३५ ॥
सांप्रत असे कलियुग । अधर्मीं प्रवर्तले जग ।
न लागे लावितां मार्ग । सद्धर्माचा ॥ ३६ ॥
पांचवे वर्षीं एके दिनीं । पाचारिलें आजोबांनी ।
भगवद्गीता काढोनि । एक श्लोक सांगितला ॥ ३७ ॥
पाठ म्हणोनि दाविला । तैसा अर्थही निरूपिला ।
आजा मनीं संतुष्ट झाला । अतिशयेंसी ॥ ३८ ॥
पुत्र होईल ब्रह्मज्ञानी । कुळें उद्धरील दोन्ही ।
ऐसें आणोनिया ध्यानीं । ईशस्तवन करीतसे ॥ ३९ ॥
असो ऐसी गृहस्थिती । प्रौढ झाला गणपती ।
मेळवी अनेक सोबती । खेळायासी ॥ ४० ॥
दगड मांडोनि देव करिती । फुलें घालोनि पूजिती ।आरती धुपारती म्हणती । तयांपुढें ॥ ४१ ॥
मातापित्यांची सेवा करी । आज्ञा नुल्लंघी क्षणभरी ।
हूडपणें न भरे भरी । क्रीडाविनोदें ॥ ४२ ॥
ऐसें असतां एके दिनीं । मध्यसमय जाली रजनी ।
उठोनि पहातसे जननी । तंव गणपती कोठे दिसेना ॥ ४३ ॥
शेजेवरी गणपती नाही । गृह शोधिलें सर्वही ।
कथिलें रावजींसी लवलाही । गणपती कोठें पाहा हो ॥ ४४ ॥
उभयतां बहु शोधिती । सर्वत्रांसी जागे करिती ।
गलबला ऐकोनि रातीं । बहुत लोक मिळाले ॥ ४५ ॥
म्हणती कोठें गेला हो बाळ । पहा पहा हो सकळ ।
लागली सर्वांस तळमळ । तर्क करिती आपुलेपरी ॥ ४६ ॥
कोणी म्हणती तस्करें नेला । अलंकार पाहोनि भुलला ।
ते घेऊन सोडील तयाला । चिंता कांही नसावी ॥ ४७ ॥
शाकिनी डाकिनी गृहस्कंध । यक्ष पिशाच समंध ।
रात्रौ विचरती प्रसिद्ध । बालकांसी पछाडिती ॥ ४८ ॥
कोणी म्हणती झोंपा भारी । कुंभकर्णासारिख्या अघोरी ।
बाळ नेलें निशाचरीं । ठाउकें नाही ॥ ४९ ॥
द्वार बंद नाहीं केलें । असावधपणें निजले ।
तस्करें मुलासी नेलें । खचित खचित ॥ ५० ॥
भजनाचा छंद बहुत । ध्वनि परिसोनि गेला खचित ।
प्रातःकालीं गृहाप्रत । येईल, स्वस्थ रहावें ॥ ५१ ॥
काही मिळाले धीट । म्हणती पुरे पुरे ही वटवट ।
शोधूं चला हो नीट । चहुं दिशांसी ॥ ५२ ॥
मध्यरात्र समयासी । पाहती सांदीकोंदीसी ।
कोणी नेलें बालकासी । कांहीं विचार सुचेना ॥ ५३ ॥
रात्रौ फिरती निशाचर । सर्प वृश्चिक दुर्धर ।
श्वापदें आणि तस्कर । निर्भयपणें ॥ ५४ ॥
शोधितां शोधितां थकले । कांहीं नदीकडे निघाले ।
मार्गीं अकस्मात देखिलें । गणपतीसी ॥ ५५ ॥
समाधीचें केलें आसन । वरी घातलें सिद्धासन ।
नासिकाग्रीं दृष्टी देऊन । रामनाम घेतसे ॥ ५६ ॥
पाहूनि मानसीं चकित । योगी असे हा निश्चित ।
मनीं चरण वंदित । सिद्धपुरुष जाणोनी ॥ ५७ ॥
हातीं धरोनि आणिला । सकळांसी आनंद झाला ।
बहुप्रकारें बोध केला । निबिड अंधारीं नच जावें ॥ ५८ ॥
कोणी म्हणती उपदेशासी । पात्रता नसे आम्हांसी ।
कारणिक अवतरले ऋषि । ज्ञानरूप केवळ ॥ ५९ ॥
सहा वर्षांचा बालक । बैसला सिद्धासनीं एक ।
अपरात्रीं नदीतटाक । श्मशानस्थान विशेष ॥ ६० ॥
यासी काय म्हणावे । दंडावें कीं वंदावें ।
स्तवावें कीं बोधावें । धाक भिती दावोनी ॥ ६१ ॥
गणपती बोले वचन । एकांतीं स्थिर होय मन ।
नामस्मरणीं अनुसंधान । प्रेमपूर वाहतो ॥ ६२ ॥
चित्त वाहे भलतीकडे । मुखें नाम हे कोरडें ।
ऐशियानें आयुष्य थोडें । पुरणार नाहीं ॥ ६३ ॥
तया म्हणती तूं वयें सान । उद्यमीं घालावें मन ।
वृद्धपणीं अनुसंधान । स्वस्थपणें करावें ॥ ६४ ॥
बहुत विद्या शिकावी । आणि भाग्यश्री भोगावी ।
जगीं कीर्ति मिळवावी । मग भजन करावें ॥ ६५ ॥
इंद्रियीं विषय सेवावे । तृप्त करोनि भजावें ।
नातरी लागेल मुकावें । दोहींकडे ॥ ६६ ॥
विषयोर्मि येतां पाहीं । भाव साधनीं न राही ।
अत्याचारें भवडोहीं । बुडतो नर ॥ ६७ ॥
प्रपंच करोनि परमार्थ । करावा बोलती संत ।
वासना झालिया निवृत्त । सुलभ होये ॥ ६८ ॥
आधीं विद्या शिकावी । इंद्रियें अतृप्त न ठेवावीं ।
मग ती परमार्थपदवी । साधनानें साधावी ॥ ६९ ॥
उपदेश नानापरी । करिती ते नरनारी ।
भूतखेतांची भिती भारी । सांगूं लागलें बाळातें ॥ ७० ॥
ऐसे आपुलाल्या मतीं । अधिकार नेणोनि बोध करिती ।
अघटित करणी वदती । परिसिली नाहीं ॥ ७१ ॥
कांही दिवस गेल्यावरी । गणपती नसे शय्येवरी ।
रावजी निर्धारी अंतरी । एकनिष्ठ वैष्णव हा ॥ ७२ ॥
पुत्रस्नेहें कळवळला । धुंडधुंडाळोनी आला ।
म्हणे हा कोठें लपला । न कळेचि ॥ ७३ ॥
पहांटेच्या समयासी । बाळ आला गृहासी ।
रावजी पुसे तयासी । कोठे आसन घातलें ॥ ७४ ॥
येरू वदे नदीथडीं । खडकांच्या पडल्या दरडी ।
माजीं असती भगदाडीं । उपाधिरहित ॥ ७५ ॥
अरे सर्प विंचू फिरती । क्रूर श्वापदें नेणो किती ।
कैसी होईल देहस्थिती । न विचारिसी ॥ ७६ ॥
देह तो प्रारब्धाधीन । कोण चुकवूं शके मरण ।
समय प्राप्त झालिया जाण । मांदुसी ही न टिके ॥ ७७ ॥
नाशिवंत नासणार । जाणोनिया निर्धार ।
आहे तंव जगदीश्वर । शाश्वत तो ओळखावा ॥ ७८ ॥
ऐकोनि ऐसीं उत्तरें । रावजीनेत्रीं नीर झरे ।
म्हणे होईल तें तें खरें । स्वस्थ राहोनि पाहावें ॥ ७९ ॥
अगाध ज्ञान पाहोन । रावजी मानी समाधान ।
म्हणे धन्य गणपती निधान । ईशकृपें लाधलें ॥ ८० ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते तृतीयाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्री सद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय तिसरा
समास तिसरा

श्रीगणेशा तुज नमन । करोनि रघुपतिस्मरण ।
श्रीगुरुलीला कथन । करितों मी यथामति ॥ १ ॥
नित्य शेळ्या चारावयासी । गणपती जातसे वनासी ।
तेथें क्रीडा करी कैसी । पाहतां असाधारण ॥ २ ॥
जमवी दगड बहुत । रचोनि भिंती करित ।
माजीं तीन खडे बैसवीत । नामें सांगे तयांचीं ॥ ३ ॥
मध्यें उभा श्रीराम । जो भक्तां देई आराम ।
सव्यभागीं भक्त परम । लक्ष्मण उभा असे ॥ ४ ॥
वामभागीं सीताबाई । जगद्वंद्य जगाची आई ।
पुढें मारुति वज्रदेही । एक खडा ठेवित ॥ ५ ॥
मित्रांची मांदी मेळविली । दगडांचीं देउळें केलीं ।
मग क्रीडा आरंभिली । कैसी पहा ॥ ६ ॥
हातांतील काष्ठासी । वीणा म्हणोनि स्कंधप्रदेशीं ।
घेवोनि दगड टाळेसी । मेळविती अनेक ॥ ७ ॥
रामनामाचा गजर करिती । छोट्या पाउलीं नाचती ।
दगडीं दगड वाजविती । भजन करिती आनंदें ॥ ८ ॥
मित्रांमाजी मित्र खरा । नामें बापू फडतरा ।
गणपतीवांचोनिया जरा । दुरी न राहे ॥ ९ ॥
गणपती जी जी आज्ञा करी । सुलभ कठिण आदरी ।
न विसंबती क्षणभरी । एकासी एक ॥ १० ॥
वाटे हा पहिला शिष्य । गुरुवचनीं विश्वास ।
नामाचा घे बहु ध्यास । सद्‍गुरुबोधें ॥ ११ ॥
असो ऐसी भजनस्थिति । नित्य आवडी चित्तीं ।
गणूबुवा ऐसें म्हणती । बाळमित्र कौतुकें ॥ १२ ॥
उपजत ज्ञानज्योती । न झांके झांकितां दीप्ती ।
गणूबुवा म्हणोनि वंदिती । चरण सद्गुरूचे ॥ १३ ॥
जैसा मलयगिरीचंदन । सुवासेंसी पैसावोन ।
तैसा वेधी पराव्याचें मन । स्वतेजें आपणाकडे ॥ १४ ॥
पंचाननाचे छाव्यासी । सलगी न करवे जीवासी ।
वयें अल्प परि सर्वांसी । आकर्षत स्वसत्तें ॥ १५ ॥
नागरिकजन आश्चर्य करिती । पोरें यासवेंचि धांवती ।
रानीं जाऊन भजन करिती । धाक न मानिती आमुचा ॥ १६ ॥
रावजीपंत तुमचा पुत्र । मधुरवचनी जगन्मित्र ।
बालकें जमवी सर्वत्र । नायकती गृहकाजें ॥ १७ ॥
घरीं अल्पही न राहती । गणूबुवा म्हणोनि धांवती ।
मायबापाहूनि चित्तीं । प्रिय वाटतो सकळांसी ॥ १८ ॥
यासी बोध करावा कांहीं । अथवा बैसवावें गृहीं ।
वेड लाविलें सकळांही । स्वच्छंदपणे ॥ १९ ॥
तैसा शाळेसी जातां । सकळांसि म्हणे तुम्ही आतां ।
राम राम लिहोनि कित्ता । मजलागीं दावावा ॥ २० ॥
तेंचि काढोनि दाविती । पंतोजी बहु बोध करिती ।
कांही केल्या गणपती । नायकेचि ॥ २१ ॥
पंतोजी बोले तयासी । न यावें तुवां शाळेसी ।
सकल बाळें बिघडविसी । आमुचा धंदा बुडेल ॥ २२ ॥
पंतोजीनें धाक दाविला । गणपतीसी न मानला ।
दुजे दिनीं डाव मांडिला । गड्यांसह गोठ्यावरी ॥ २३ ॥
लहान थोर सवंगडी । क्रीडा करिती आवडी ।
रामभजनाची परवडी । मांडिली कौतुकें ॥ २४ ॥
पंतोजी शाळेमाजीं पाहती । परि एकही नसे विद्यार्थी ।
चिंता उपजली चित्तीं । आतां कैसें करावें ॥ २५ ॥
गृही वृतांत निवेदिला । गणपतीनें पुंडावा केला ।
समजावूनि पाठवा त्याला । विद्यालयीं ॥ २६ ॥
आजा चुलता उपदेशिती । पुन्हां शाळेसी धाडिती ।
माय उपदेशी ‘गणपती । तुवां ऐसे न करावें ॥ २७ ॥
वडिलार्जित कुलकरणवृत्ती । चालविली पाहिजे निगुती ।
विद्या करावी पुरती । न करीं कुचराई’ ॥ २८ ॥
गणपती बोले ‘गे प्रमाण । सर्वही येतें मजलागोन ।
काळजी न करावी, वतन । सांभाळीन दक्षत्वें ॥ २९ ॥
रामनामाची आवडी । काय सांगूं तुज गोडी ।
श्रवण करीं एक घडी । प्रेम कैसें उफाळे’ ॥ ३० ॥
ऐसीं वदोनि उत्तरें । रामनाम मंजुळस्वरें ।
घेऊं लागला प्रेमभरें । माय ऐके तटस्थ ॥ ३१ ॥
रामनामाची गोडी । चाखितां चालली घडी ।
वृत्ति गुंतली आवडी । सांज झाली कळेना ॥ ३२ ॥
सकळांसी लाविली चट । रामनामाचा घडघडाट ।
दुरितें सोडिली वाट । गोंदावलीची ॥ ३३ ॥
नऊ वर्षांचे अवसरीं । रावजी मनीं विचार करी ।
व्रतबंध कराया बरी । वयसीमा ॥ ३४ ॥
कुलगुरूसी पाचारोनि । उच्चनीच ग्रह बघोनि ।
मुहूर्त ठरवा उपनयनीं । ऐसें सांगे ॥ ३५ ॥
मुहूर्त बरवा शोधिला । द्रव्यनिधि मोकळा केला ।
मातापितयां आनंद झाला । मनींची हौस पुरवूं वदती ॥ ३६ ॥
सोयरे जमविले सकळ । याज्ञिकी विप्रांचा गोंधळ ।
मौंजीबंधनाची वेळ । आली म्हणती समीप ॥ ३७ ॥वाद्यें वाजती घडाघडा । मातृभोजनीं काळ न दवडा ।
घटिका भरली वेळ थोडा । सावधान म्हणती ॥ ३८ ॥
पितापुत्र बोहल्यावरी । मंगलाष्टकें सुस्वरीं ।
द्विज म्हणती सावध सत्वरी । मंगलमुहूर्तीं असावें ॥ ३९ ॥
गणपती विचारी मानसीं । हे सावध म्हणती आम्हांसी ।
असावध कोणेविषीं । राहिलो मी ॥ ४० ॥
चित्त देऊनि करी श्रवण । मंत्रार्थ पाहे विवरोन ।
कोठें असती उपनयन । द्विजत्व तेंही दिसेना ॥ ४१ ॥
गायत्री मंत्र उपदेशिला । एकचित्तें पठण केला ।
ॐ तत्सत् अनुभवाला । आलें पाहिजे ॥ ४२ ॥
अनुभवी तोचि ब्राह्मण । येर कुलधर्मपालन ।
ऐसे करितसे मनन । मनामाजीं ॥ ४३ ॥
परिधानासी कौंपीन । प्रावरणासी कृष्णाजिन ।
वैराग्यद्योतक चिन्ह । मनी म्हणे ॥ ४४ ॥
कंठी घालिती यज्ञोपवीत । जें ब्रह्मग्रंथीनें ग्रथित ।
अनुसंधान ठेवावें हा हेत । स्वस्वरूपी ॥ ४५ ॥
कर्मफलानें बांधला । मौंजीबंधनें व्यक्त केला ।
विवेकें पाहिजे सोडविला । जीवात्म्यासी ॥ ४६ ॥
यमनियम दंड देती । भिक्षाहारें उदरपूर्ती ।
लोभ न धरावा चित्तीं । कोणाविषयीं ॥ ४७ ॥
भिक्षा घालोनि म्हणे जननी । चहूं वेद षड्दर्शनीं ।
निपुण होईं अठरा पुराणीं । गुरुबोधें ॥ ४८ ॥
आप्तइष्ट कुलगोत । भिक्षा घालोनि निरोप देत ।
गुरुकृपें ज्ञानोन्नत । व्हावें तुवां ॥ ४९ ॥
बोलती सकल मंत्र मुखें । परि अर्थातें कोणी न देखे ।
विरळा सद्‍गुरुसारिखे । अर्थ विवरिती ॥ ५० ॥
बोलणें एक करणें एक । तो न म्हणावा विवेक ।
परि कालचक्राचें कौतुक । ऐसेंचि आहे ॥ ५१ ॥
कण जावोनि भूस राहिलें । भूषणावांचूनि छिद्र उरलें ।
जाणते पुरुषीं जाणिलें । येर अवघे म्हणती सोहळा ॥ ५२ ॥
कुलगुरु तेंचि सांगती । संध्योपासना शिकविती ।
अग्निकार्य करावें म्हणती । नित्यनेमें ॥ ५३ ॥
प्राणायामीं नासिकासी । करविती हस्तस्पर्शासी ।
न जाणती योगासी । मार्गमळण ॥ ५४ ॥
जैसा गुरु तैसा चेला । निपट बोध वायां गेला ।
गणपती मनीं खोचला । समाधान नाहीं ॥ ५५ ॥
गुरु स्वयें अनधिकारी । शिष्यातें कैसा उद्धरी ।
सद्‍गुरुदयाळांची सरी । येणार नाही ॥ ५६ ॥
भिडें भिडें भिडो जातां । न सुटे कर्माकर्मगुंता ।
सद्‍गुरुपद तत्त्वतां । शोधिलें पाहिजे ॥ ५७ ॥
ऐसें बहुतां प्रकारीं । गणपती विवेकें विवरी ।
चटका लागला अंतरीं । उपदेशाचा ॥ ५८ ॥
इतर मिष्टान्नें जेविती । किती उठती ब्राह्मणपंक्ती ।
दक्षिणा देऊन बोळविती । याचकांसी ॥ ५९ ॥
व्रतबंध सांग झाला । सकलां आनंद वाटला ।
पाहुणे समुदाय बोळविला । वस्त्रें देउनी ॥ ६० ॥
गणपती बालब्रह्मचारी । संध्यावंदनादि कर्में करी ।
म्हणे मागावी माधुकरी । आज्ञा असे गुरूची ॥ ६१ ॥
चारी वेद शिकावे । षड्दर्शना जाणावें ।
पुराणीं व्युत्पन्न व्हावें । ब्रह्मपद पावावया ॥ ६२ ॥
चहूं वेद किती असती । शास्त्रें कैशीं शिकों येती ।
गुरुसेवेची कैसी स्थिती । मज निरूपावी ॥ ६३ ॥
उपाध्ये बोलती बाळा । वेद अनंत आगळा ।
एकही न वचे शिकला । आयुष्यवरी ॥ ६४ ॥
शास्त्रेंही असती अपार । तैसाचि पुराणांचा विचार ।
कलियुगीं उतरे पार । ऐसा नाहीं ॥ ६५ ॥
गुरूसी द्यावें धन । मानावें गुरुवचन ।
कार्याकार्य विद्या पठण । करोनि स्वस्थ असावें ॥ ६६ ॥
जेणें राहे वतन वृत्ती । ती विद्या करावी पुरती ।
अधिकारी तोषवावे चित्तीं । मधुरवचनीं ॥ ६७ ॥
आमुचा तों हाचि धंदा । यजमानास राखों सदा ।
उदरपूर्तीवांचुनि कदा । आन नेणों ॥ ६८ ॥
येणें नव्हे समाधान । अंतरती श्रीचरण ।
उत्तम नरदेह पावोन । व्यर्थ होय ॥ ६९ ॥
वेदें जैसें आज्ञापिलें । तैसें पाहिजे वर्तलें ।
लौकिकीं नसे बोलिलें । भगवद्वाक्यें प्रत्यक्ष ॥ ७० ॥
तरी ऐसा जो कां ज्ञानराशी । तोचि शोधूं अहर्निशी ।
हिंडू आतां दशदिशीं । सद्‍गुरुपद शोधाया ॥ ७१ ॥
सद्‍गुरुकृपा होतां पाहीं । जगीं दुर्लभ नसे कांही ।
सज्जन कथिती ठायीं ठायीं । भगवद्वाक्यें ॥ ७२ ॥
जें वेदविद्येचें दैवत । परमगुह्य गुह्यातीत ।
होतां सद्‍गुरुपदांकित । ठायीं पडे ॥ ७३ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते तृतीयाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय तिसरा
समास चवथा

जयजय श्रीआत्मारामा । भूतां व्यापूनि रिकामा ।
अखंड आनंदसुखधामा । हृदयनिवासी ॥ १ ॥
जवळीं असोनि उमजेना । विषयीं धांवे वासना ।
विभक्तपणे नमितो चरणा । ध्यान राहो अखंड ॥ २ ॥
व्रतबंधनाउपरी । गणपती नाना क्रीडा करी ।
बटुवेष कौपीनधारी । चित्त वेधी पाहतां ॥ ३ ॥
गृहीं वृद्ध लिंगोपंत । बाललीलें होती मुदित ।
पुनरपि गीताई प्रसूत । पुत्र कन्या लाधली ॥ ४ ॥
अण्णा असे पुत्र नाम । मुक्ताई कन्या सुरूप परम ।
सकळांचे अति प्रेम । गणपतीवरी ॥ ५ ॥
तैसे गुलगुरु सखारामभट्ट । पाठक उपनामें कर्मनिष्ठ ।
पत्रिका वर्तविती नीट । विद्वान् होते बहुगुणी ॥ ६ ॥
यांचे पुत्र वामनबुवा । हेचि कर्ते होते तेव्हां ।
तयांचे पुत्र चिंतूबुवा । खेळगडी गणपतीचे ॥ ७ ॥
अप्पा पाटील गांवकर । पुत्र दाजीचा चतुर ।
बाळा तयाचा कुमर । कुलकर्ण्यावरी अति प्रीति ॥ ८ ॥
चरित्रामाजी संबंध । येईल म्हणोनि विशद ।
नामें केलीं प्रसिद्ध । उभय कुलांची ॥ ९ ॥
पंतोजी अण्णा खर्शीकर । व्यवहारविद्येमाजीं चतुर ।
परि नेणती अधिकार । गणपतीचा ॥ १० ॥
एके समयीं ऐसें झालें । गुरुजी स्वल्प गृहीं आले ।
इकडे भजन आरंभिलें । शिष्यवर्गें ॥ ११ ॥
पंतोजींसीं राग आला । छडी मारिती सर्वांला ।
मुलें म्हणती गणपतीला । कैसा विचार करावा ॥ १२ ॥
येरु वदे सर्वांसी । स्वस्थ रहावें मानसी ।
रामद्वेषीं नरासी । शिक्षा होईल त्वरित ॥ १३ ॥
संवगड्यांतील मुलांनीं । अप्पा पाटिला भेटुनी ।
वृत्तांत कथिला मृदुवचनीं । पंतोजींचा ॥ १४ ॥
तुमचे वेश्येपाशी । पंतोजी जाती अहर्निशी ।
भलतें भासतें आम्हांसी । तुमचे तुम्ही पहावें ॥ १५ ॥
पाटील होता विषयग्रस्त । कर्णीं वाक्यें झोंबत ।
दांतओठ खात खात । निघाला तेथोनी ॥ १६ ॥
एकडे गुरुजींची स्वारी । शाळेंतूनि जातां घरीं ।
बैसले तेथें क्षणभरी । पान खात ॥ १७ ॥
बोलाफुला गांठ पडली । पाटलाची स्वारी आली ।
तळची आग मस्तका गेली । निष्ठुरपणें मारित ॥ १८ ॥
मारमारोनि केला विकळ । लोक धांवले सकळ ।
वृत्तांत परिसोनि नवल । अत्यंत भासलें ॥ १९ ॥
ऐसें नव्हे पाटिलबुवा । गणपतीने केला पुंडावा ।
पंतोजी तुम्हीं त्याचे नांवा । कदापि काधूं नये ॥ २० ॥
तो असे भगवद्भक्त । श्रीकृष्णासारिखा धूर्त ।
जाणावें हें सत्य । त्याचे वाटेसी नच जावें ॥ २१ ॥
शाळा सोडिली अण्णांनी । निघाले गाडी भरोनी ।
मार्गीं तयांसी गांठोनी । उपदेशी ब्रह्मचारी ॥ २२ ॥
रामभक्तासी वैर । करितां दुःख होतें फार ।
आतां तरी रघुवीर । स्मरत जावा ॥ २३ ॥
दो दिवसांची चाकरी । रामकृपेची भाकरी ।
तोचि तारी आणि मारी । शरण जावें तयासी ॥ २४ ॥
ऐशी क्रीडा नानापरी । करितसे ब्रह्मचारी ।
मित्रांचा जो कैवारी । संकटसमयीं ॥ २५ ॥
धांवण्यामाजीं चपळ । मुखीं हास्य सोज्ज्वळ ।
तनु दिसे कोमल । उड्या घेई वृक्षावरी ॥ २६ ॥
विनोदी असोनि निश्चल । धीट आणि कोमल ।
वक्तृत्वें भुलवी सकल । लहानथोर ॥ २७ ॥
रामनाम हाचि छंद । हीच क्रीडा विनोद ।
अंतरीं ध्यायी सद्‍गुरुपद । कैं देखेन डोळां ॥ २८ ॥
शाळेसी निमित्तमात्र जाई । विद्या येतसे सर्वही ।
आश्चर्य मानिती पाहीं । बुद्धिप्रभाव देखोनी ॥ २९ ॥
कोळशाची शाई करोनि । अर्कपत्रें काढी लिहोनी ।
रामनामें वृक्ष भरोनी । प्रदक्षिणा करितसे ॥ ३० ॥
पाहोनि क्रीडाकौतुक । आश्चर्य करिती लोक ।
लिंगोपंत धूर्त तार्किक । विचार करी मानसीं ॥ ३१ ॥
हा होईल भगवद्भक्त । प्रपंचीं राहील विरक्त ।
उदासीन वागे सतत । वय सान असोनी ॥ ३२ ॥
तरी हा हातींचा जाईल । रानीं वनीं फिरेल ।
विरक्तपणें वागेल । जनांमध्यें ॥ ३३ ॥
यास्तव शीघ्रची लग्नग्रंथी । घालूं म्हणे रावजीप्रती ।
मानलीं सकलांसि युक्ति । गीताआदिकरोनी ॥ ३४ ॥
शोधूं लागले नोवरी । कुलवंत स्वरूपें बरी ।
जाणोनिया वतनदारी । पाहों येती अनेक ॥ ३५ ॥
गोडसे उपनामी संभाजीपंत । कुलकर्णी खातवळीं वसत ।
तयांची कन्या नेमस्त । केली असे ॥ ३६ ॥
वय सान गौरवर्ण । कुलशील शुभलक्षण ।
वर द्वादशीं एक न्यून । जोडा शोभतसे साजिरा ॥ ३७ ॥
वाङ्निश्चय सीमांतपूजन । विवाहहोम अन्नदान ।
सरस्वती ठेविलें नामाभिधान । समारंभ सांग केला ॥ ३८ ॥
परि गणपती उदासीन । म्हणे कासया हें बंधन ।
कैं देखेन सद्‍गुरुचरण । भवसिंधुतारक ॥ ३९ ॥
विवाह म्हणजे सजीव बेडी । जी थोरथोरांस करी वेडी ।
सद्वासना धडफुडी । असेल तीही घालवी ॥ ४० ॥
नरदेहाचा अधिकार । स्वयें व्हावें विश्वंभर ।
परि करित किंकर । बहुतांचा बहुपरी ॥ ४१ ॥
भलतियाचे आर्जव करवी । कोणा दुरुत्तरें बोलवी ।
नसताचि मोह लावी । पाठीमागें ॥ ४२ ॥
सुकर्मीं वा दुष्कर्मी । प्रवृत्त व्हावे धनागमीं ।
एवं आयुष्य प्रपंचकामी । अहंकारयुक्त लाववी ॥ ४३ ॥
ऐसा हा मोहपाश । बहुत झाले कासाविस ।
तरला ऐसा पुरुष । भाग्यवंत विरळाचि ॥ ४४ ॥
जैसा वाईट तैसा चांगला । परि लाभे क्वचिताला ।
सोमल औषधी असे भला । जाणत्यासी ॥ ४५ ॥
गृहस्थाश्रमाची महती । बहुत गाइली धर्मग्रंथीं ।
परि विषयीं लंपट होती । बहुतेक जन ॥ ४६ ॥अतिथीसेवा अन्नदान । तिन्ही आश्रमां विश्रांतीस्थान ।
पितरदेवतांसी हवन । गृहस्थाश्रमी मिळतसे ॥ ४७ ॥
पितृऋण मातृऋण । फिटे होतांचि संतान ।
विद्याकलांचे पालन । गृहस्थाश्रमाकारणें ॥ ४८ ॥
एवं चतुर्विध पुरुषार्थ । ज्ञानिया लाभती येथ ।
अज्ञानें होतां आसक्त । अधोगती निश्चयें ॥ ४९ ॥
जरी असेल विवेक वैराग्य । तरीच हें लाधेल भाग्य ।
परि कलियुगीं ऐसा योग । घडणें कठीण ॥ ५० ॥
ज्ञानें व्हावें विरक्त । तरी संसारीं अलिप्त ।
सद्‍गुरुविना ज्ञान प्राप्त । होणार नाहीं ॥ ५१ ॥
या गृहस्थाश्रमाकारणें । देवादिकां जन्म घेणें ।
विद्या कलादि आयतनें । याजसाठीं ॥ ५२ ॥
हें सृष्टीचें उगमस्थान । याचेनि सृष्टीचें पालन ।
नीति न्याय दंडण । याचेकरितां ॥ ५३ ॥
ऐसा विवेक उदेला । हळूं हळूं वाढों लागला ।
सचिंत दिसे बैसला । ठायीं ठायीं ॥ ५४ ॥
जें देवाचें दैत । ऐसे संत महंत ।
तेचि अधिकारी येथ । वेदनिधि दावाया ॥ ५५ ॥
वेद अनंत अपार । शब्दज्ञानें न पडे पार ।
कलियुगीं अल्पायुषीं नर । धृतीही अल्प जहाली ॥ ५६ ॥
तैसा आहार विहार । दुर्जनसंगति अनिवार ।
बुद्धी सुचे तदनुसार । देहसुखाची ॥ ५७ ॥
वेदशास्त्रपठण केलें । परि देहसुखानें नाडले ।
कामधेनूपाशीं घेतलें । तक्र जैसें ॥ ५८ ॥
ऐसा कालाचा महिमा । ध्यानीं न ये परमात्मा ।
सुखासक्तीची सीमा । जाहली असे ॥ ५९ ॥
देहसुखाचीं साधनें । शोधिती ते शहाणे ।
बहु द्रव्य मिळवूं जाणे । तो पुरुष उत्तम ॥ ६० ॥
पंचभूतांचे मिळवणी । सुखसोयी साधिती झणीं ।
तीचि म्हणती ज्ञानी । जनरूढी ॥ ६१ ॥
जो भूतांचा जनिता । त्रिभुवनीं जयाची सत्ता ।
तयासी न पाहतां । प्रकृतिसुखें धुंडाळिती ॥ ६२ ॥
प्रकृतिमाजीं सुख इच्छिलें । ते पुरुष अज्ञानी गणले ।
रावणादिक भले भले । सत्यलोकीं सत्ता ज्यांची ॥ ६३ ॥
वसिष्ठ-विश्वामित्रांची कथा । पाहतां कळे ज्ञानसत्ता ।
सद्‍गुरुकृपें येई हातां । विमल ज्ञान ॥ ६४ ॥
मुळीं प्रकृति नाशिवंत । तिचीं कर्मेंही अशाश्वत ।
ठायीं पाडावें शाश्वत । तरीच ज्ञानी म्हणवावें ॥ ६५ ॥
वेद अनंत बोलिले । प्रवृत्तिज्ञान विशद केलें ।
निवृत्ति संकेतें दाविले । अगोचर जया ॥ ६६ ॥
वेदां जे अगोचर । तें संतांसी गोचर ।
मूळ सांपडतां तरुवर । हातीं येई ॥ ६७ ॥
गुरुकृपेवांचूनि कांहीं । सर्वथा सार्थक होणें नाहीं ।
खूणगांठ बांधोनि हृदयीं । न्याहाळितसे सूक्ष्मदृष्टीं ॥ ६८ ॥
कोणी येतां साधुसंत । म्हणे दाखवा भगवंत ।
वेदशास्त्रांचा मतितार्थ । उकलोनि दावा ॥ ६९ ॥
चार वेद सहा शास्त्रें । अठरा पुराणें उपसूत्रें ।
शिकवा समग्र मंत्र तंत्रें । येके दिनीं ॥ ७० ॥
ऐसा करितां प्रश्न । म्हणती आम्हां नसे ज्ञान ।
गुरुचरणीं व्हावें लीन । ज्ञान येईल तुजलागीं ॥ ७१ ॥
येरु वदे ऐसे संत । कोणें ठायीं नांदत ।
ठाउके तरी पुरवा हेत । कृपा करोनी ॥ ७२ ॥
भवतारक सद्‍गुरु संत । गृहीं गुंततां नोहे प्राप्त ।
लोभ सांडोनि गिरीगव्हरांत । तीर्थीं क्षेत्रीं शोधावे ॥ ७३ ॥
जयांची होतां कृपादृष्टी । अज्ञान ज्ञानासह उठी ।
जन्ममृत्यु आटाआटी । भवग्रंथी तुटेल ॥ ७४ ॥
गुरुशोधाचा निश्चय केला । सोबत्यांसी निवेदिला ।
जे न वदती कवणाला । विश्वासू परम ॥ ७५ ॥
चुलत बंधु दामोदर । दुजा वामन म्हासुर्णेकर ।
दोघां मानवला विचार । सांगातें येऊं म्हणती ॥ ७६ ॥
तंव गृही लिंगोपंत । जरेनें जाहले ग्रस्त ।
मृत्युचिन्हें उमटली जेथे । ते गेले निजस्थाना ॥ ७७ ॥
कोणी हळहळूं लागले । कोणी म्हणती भलें झालें ।
पुत्रपौत्रांदेखत गेले । कलियुगीं अलभ्य ॥ ७८ ॥
लिंगोपंत पुरुष भला । कार्यकर्ता होऊनी गेला ।
ईश्वर तयाचे आत्म्याला । शांति देवो ॥ ७९ ॥
लिंगोपंत निघोन गेले । रावजी कर्ते झाले ।
गणपती वरी खेळ खेळे । मनीं ध्यायी श्रीगुरु ॥ ८० ॥
गुरु शोधायाकारणें । शीघ्रचि गृह त्यागणें ।
सार्थक अन्य साधनें । होणार नाहीं ॥ ८१ ॥
व्रतबंध शुभवेळीं । मातापित्यांची आज्ञा झाली ।
करोनि गुरुसेवा वहिली । विद्या तुवां शिकावी ॥ ८२ ॥
भिक्षा मागोनि उदरपूर्ति । अखंड धरावी शांति ।
ब्रह्मचर्य पाळोनि क्षतीं । विचरावें सकळ ॥ ८३ ॥
ऐशा आज्ञेची पूर्तता । झाली नसे तत्त्वतां ।
तीच मानोनि आतां । सांग करावी ॥ ८४ ॥
आधी उपजत ज्ञान । वेदशास्त्र निमित्त जाण ।
पुधील कार्या अनुलक्षून । निश्चय केला जाण्याचा ॥ ८५ ॥
द्वादश वर्षांचे वय । क्रीडासक्तीचा समय ।
परि वैराग्यउदय । दृढ झाला ॥ ८६ ॥
तिथि वार निश्चित केला । प्रातःकालीं उठोनि गेला ।
सोबती धांवले साह्याला । मागील दोघे ॥ ८७ ॥
गुरुभेटीची आर्त । धरूनि चालिले वनांत ।
तोडिली मायेची मात । दुर्जय दुर्निवार ॥ ८८ ॥
सरिता-सागर संगम । समरसें पावेल विश्राम ।
श्रवण केलिया हरती श्रम । भाविकांचे ॥ ८९ ॥
पुढील अध्यायीं ऐसी कथा । सद्‍गुरु होईल बोलविता ।
वत्स धेनूसी पितां । गळती सेवूं ॥ ९० ॥
इति श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ९१ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते तृतीयाद्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय चवथा
समास पहिला

समर्थानुयायी तुकाराम सिद्ध । जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध ।
तया प्रार्थुनी राममंत्रासि घेती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ४ ॥

नमो सद्‌गुरु योगेश्वरा । करुणाकरा परमोदारा ।
भवभीतासी थारा । आत्मरूपा ॥ १ ॥
बहुत जन्मीं जाहलो कष्टी । कामक्रोधें घातली मिठी ।
दुष्ट वासना पाठींपोटीं । लुबाडीतसे ॥ २ ॥
तेणें जाहलो भिकारी । चौर्यांशी लक्ष गेलों घरी ।
परि शांति नसे अणुभरी । कासावीस झालो ॥ ३ ॥
तंव अवचटें इये सदनीं । पावलो, तेथें श्रीमंत धनी ।
भेटला, करितो विनवणी । तळमळ निववा दातारा ॥ ४ ॥
वेदशास्त्रें वर्णिली कीर्ति । दया क्षमा बोध शांति ।
अनन्यभक्तीची संपत्ति । वसते येथ ॥ ५ ॥
कर्ण नाशिवंतदाता । सद्‌गुरु देई शाश्वता ।
पुनरपि मागण्याची आस्था । अल्पही उरेना ॥ ६ ॥
ऐसी कीर्ती परिसिली । तेव्हां धांव घेतली ।
परि द्वारीं आड पडलीं । थोर थोर ॥ ७ ॥
अविश्वासें ढकलोनि दिलें । देहलोभ पडळ आलें ।
अहंतेनें पांगुळें केलें । मजलागीं दयाळा ॥ ८ ॥
निद्रा आळस चंचल मन । आड कांटेरी कुंपण ।
अज्ञानतिमिर फिरफिरोन । अभक्तिकूपीं लोटतसे ॥ ९ ॥
पापपुण्यांच्या भगदाडी । मतांमतांच्या दरडी ।
ढकलोनी देवविती बुडी । स्वर्गनरकी ॥ १० ॥
बहुत केल्या येरझारा । अद्यापि न ये शिसारा ।
दयासिंधो सद्‌गुरुवरा । दीनाकडे पाहावें ॥ ११ ॥
दीपाजवळील पांखरें । तैसें मज जाहलें खरे ।
भाजते परि तें बरवें । मोहयोगें भासतसे ॥ १२ ॥
ऐसे मोहाचें पडळ । विवेक वैराग्य नसे बळ ।
तेणें जाहलो विकळ । दीर्घस्वरें बाहतो ॥ १३ ॥
तूं बा दीनांचा कनवाळू । धांव घेईं न करी वेळू ।
विझवी हा मायाजाळू । कृपामृत वर्षोनी ॥ १४ ॥
काकुळती वाट पाहे । काळ पाठीसी उभा आहे ।
क्षण न लागतां घालील घाये । उपेक्षा कासया मांडिली ॥ १५ ॥
भक्त थोर तेजोराशी । मी दीन म्हणोनि अव्हेरिसी ।
तरी दीनदास कां म्हणविसी । दीनानाथा गुरुराया ॥ १६ ॥
श्रवणीं मम स्वर न पडे । ऐसें म्हणता सर्वज्ञता मोडे ।
तुम्हांसी अज्ञेय मागें पुढें । कोठेंही असेना ॥ १७ ॥
जरी म्हणाल साधनबळें । दवडावीं सर्व किडाळें ।
तरी मायामोहें मज आंधळें । केलें असे जी दयाळा ॥ १८ ॥
आंधळ्या- पांगळ्यांचा । आधार तूं एक साचा ।
यास्तव दीनवाचा तुजसी आहीं बाहतो ॥ १९ ॥
धांव धांव गुरुराया । मायेनें आणिले आया ।
आठविलें तव पाया । आतां उपेक्षा न करावी ॥ २० ॥
स्वामी जरी उपेक्षिती । मग आधार नसे त्रिजगतीं ।
म्हणोनि येतों काकुळती । कृपादृष्टीं विलोकावें ॥ २१ ॥
जरी म्हणाल पोपट । मुमुक्षुत्व नसेल धीट ।
तरी हा दारींचा भाट । ब्रीद राखा आपुलें ॥ २२ ॥
मायेनें त्यजिलें बाळासी । कोणी भेटेल मावशी ।
रायें त्यजितां प्रजेसी । देव साह्य करील ॥ २३ ॥
परि तुम्ही टाकिल्यावरी । थारा न मिळे अवनीवरी ।
म्हणोनि विनवणी आदरीं । मायबापा गुरुराया ॥ २४ ॥
आठवावे तुझे पाय । अन्य न जाणें उपाय ।
जाणोनि देईं सोय । चरणांवरी ॥ २५ ॥
मागील अध्यायी कथा । सद्‌गुरु निघाले सांडोनि ममता ।
दामू वामन संगती असतां । पावले करवीरनगरीं ॥ २६ ॥
अयाचित भोजन करिती । परस्परें साह्य होती ।
सतेज दिसे गणपती । मोहवी मन जनाचें ॥ २७ ॥
कोणी पक्वान्नें ओपिती । कोणी येऊन दर्शन घेती ।
कोणी पाहोन आश्चर्य करिती । तपस्तेज म्हणती हे ॥ २८ ॥
देखोनि गणपतीचे गुण । दत्तक घेऊं आपण ।
म्हणोनि गुरुजी कोणी भावसंपन्न । अत्याग्रह मांडिला ॥ २९ ॥
सद्‌गुरु सत्वर निघाले तेथुनी । इकडे जगदंबाभेट घेउनी ।
दामू आला परतोनि । गृहीं वृत्तांत निवेदिला ॥ ३० ॥
वामनबुवा म्हासुर्णेकर । पुढें कांही दिवस बरोबर ।
होते तेही माघार । घेऊन आले गृहासी ॥ ३१ ॥
इकडें काय झालें गोंदावलीं । दोन प्रहर वाट पाहिली ।
मग माउली सचिंत झाली । बाळ कोठे दिसेना ॥ ३२ ॥
रावजी झाले चिंताक्रांत । ग्राम समस्त धुंडाळित ।
नदीतीरीं जावोनि पाहात । बैसला असेल एकांतीं ॥ ३३ ॥
रानोमाळीं शोधिती । गांवोगांवी दूत प्रेषिती ।
परि कोठें न दिसे गणपती । दुःख करिती अनिवार ॥ ३४ ॥
अज्ञान सान बालक । सोडोनि गेला गृहसुख ।
कोण करील त्याचे कौतुक । खाऊं जेवूं घालील ॥ ३५ ॥
ऊन पाऊस थंडी वारा । कोण देईल निवारा ।
नयनीं लोटती अश्रुधारा । पुत्रस्नेहें ॥ ३६ ॥
कोणी नाही मारिलें । अथवा रागें भरिले ।
कोण्याकारणें रुसोनि गेलें । सोडोनि आम्हां पाडस ॥ ३७ ॥
आमुचे जीवींचे जीवन । सद्गुणी चातुर्याची खाण ।
भगवद्भजनी अनन्य । कोठें गेला कळेना ॥ ३८ ॥
देवानें दृष्टांत दिला । सिद्धपुरुष होईल भला ।
साधन साधावया गेला । गृहत्याग करूनी ॥ ३९ ॥
कांही तर्क चालेना । गुण आठविती नाना ।
कोणी शोधूनि सांगा ना । पुत्रवार्ता ॥ ४० ॥
ऐसे दुःख बहुपरी । करूं लागले ते अवसरीं ।
जमोनि बोधिती शेजारी । भेटी येईल मागुता ॥ ४१ ॥
तो सद्वर्तनी चतुर । कदा न करी अविचार ।
भेटेल तुम्हांसी सत्वर । चिंता न करावी ॥ ४२ ॥
माता पिता मित्रगण । समस्त होती उद्विग्न ।
पाडस चुकतां जैसी जाण । धेनू फोडी हंबरडा ॥ ४३ ॥
तव दामू परतोनि आला । गृहीं वृत्तांत निवेदिला ।
सद्‌गुरु शोधासी गेला । तुमचा सुत ॥ ४४ ॥परिसोनि ऐसी वार्ता । शोधूं धावले सद्गुणी सुता ।
मार्गीं अवचित भेटतां । घेवोनि आले गृहासी ॥ ४५ ॥
कांही दिवस राहोनि । पुनरपि गेला निघोनि ।
शोक करिती जनक जननी । हातीं न लागे पुत्र हा ॥ ४६ ॥
दामू वामन शांतविती । त्यासी कोठेंही नसे कमती ।
बहुत जन दर्शन घेती । आयती पुरविती अनेक ॥ ४७ ॥
तो ज्ञानी वैराग्ययुक्त । श्रीगुरूसी शोधित ।
येईल पुरल्यावरी हेत । तुम्ही चिंता न करावी ॥ ४८ ॥
सद्‌गुरुभेटीवांचून । गणपती न ये परतोन ।
निश्चय मनीं धरून । समाधान मानिती ॥ ४९ ॥
इकडे गणपती बाळ । फिरतसे रानोमाळ ।
कोठें सद्‌गुरु दयाळ । भेटतील कीं ॥ ५० ॥
नाना तीर्थे नाना देश । गिरिगव्हरे विशेष ।
नदीतटाकीं बहुवस । शोधित फिरे ॥ ५१ ॥
शास्त्री पंडित वैदिक । अध्यात्मवादी पुराणिक ।
भजनी गोसावी भाविक । योगी आणि हठयोगी ॥ ५२ ॥
मठपती फडपती हरिदास । संन्यासी आणि परमहंस ।
गृहधर्मी परि उदास । संतचरणीं सादर जे ॥ ५३ ॥
तैसे गुरुपरंपरागत । गुरुभक्त हरिहरभक्त ।
ब्रह्मचारी कर्मठ शाक्त । शुद्ध ज्ञानी वैरागी ॥ ५४ ॥
बाह्य वेडे अंतरी शाहाणे । राजयोगी अलिप्तपणे ।
करिती जे तीर्थाटनें । सिद्धि चमत्कार दाविते ॥ ५५ ॥
ऐसियांचिया घेती भेटी । करिती तयांसवे गोष्टी ।
न्याहाळिती सूक्ष्मदृष्टी । सत्यासत्य ॥ ५६ ॥
कोणी मानाचे भुकेले । कोणा धनानें भुलविलें ।
किती स्त्रीसंगें भ्रष्टले । सोंग राहिलें केवळ ॥ ५७ ॥
कित्येक बोलती जैसे भाट । अनुभवहीन धीट पाठ ।
मधुर गायनीं लाविती चट । भाविकांसी ॥ ५८ ॥
कित्येक सिद्धि उपभोगिती । तेणेंचि समाधान मानिती ।
कित्येक धर्म उच्छेदिती । म्हणती आम्ही अद्वैती ॥ ५९ ॥
साधुत्वाचें नांवाखाली । दुष्कर्में कोणी झांकिली ।
वरी दिसलीं भलींभलीं । कवंडळासारिखी ॥ ६० ॥
योगभ्रष्ट कोणी झाले । उपासनेविण ज्ञान बोले ।
वैराग्य नाहीं देखिले । देहासक्त ॥ ६१ ॥
कांहीं ते उदरदास । म्हणती आम्ही हरिदास ।
मोलें ज्ञान विक्रयास । मांडिती बाजारीं ॥ ६२ ॥
जें मोलें विकतां न ये । कोणी कोणा देतां न ये ।
वासना जिंकोन जो जाये । तयासीच प्राप्त ॥ ६३ ॥
कित्येक वडिलोपार्जित साधु । वैराग्योपासना ना बोधु ।
अहंकारी स्वयंसिद्धु । म्हणती आम्ही ॥ ६४ ॥
गायनाचे भोक्ते कोणी । लक्ष वेधिलें सुरांनी ।
दुरी राहिला चक्रपाणी । नाठवें जया ॥ ६५ ॥
कित्येक अत्यंत कर्मठ । संशयें ग्रासिले सगट ।
दयेची झाली ताटातूट । कर्मही सांग घडेना ॥ ६६ ॥
कोणी संपत्तिचे बळें । साधुत्वाचे करिती चाळे ।
अंतरीं भाव ते वेगळे । बाजारी दिसती ॥ ६७ ॥
असो ऐसे बहुत प्रकार सांगतां न ये अनिवार ।
भोळ्या भाबड्यां चमत्कार । दावोनि नादीं लाविती ॥ ६८ ॥
बाह्य सोंग संपादिती । अंतरें मलिन राखिती ।
पुढें आतां ऐसीचि स्थिती । होणार आहे ॥ ६९ ॥
क्वचित् स्थळी भगवद्भक्त । हरि जयांचा अंकित ।
भक्तिज्ञानवैराग्ययुक्त । त्यांचीं लक्षणें अवधारा ॥ ७० ॥
नित्य तृप्त ज्यांचे चित्त । जे पूर्ण ज्ञानी विरक्त ।
निःसंदेही गुणातीत । ब्रह्मानंदीं अनन्य ॥ ७१ ॥
आशासूत्र जळोनि गेले । चित्त चैतन्यचि झालें ।
लोकेषणेसी न वंचले । निरहंकृती ॥ ७२ ॥
देही असोनी विदेही । द्वेष मत्सर मुळीं नाहीं ।
भूतीं भगवद्रूप पाही । सहज समाधी भोगिती ॥ ७३ ॥
जाणोनि निर्गुणाची खूण । सगुणभक्ति करी गहन ।
निरालस्य निर्विकार मन । स्थिरबुद्धी जयाची ॥ ७४ ॥
दया-शांतीचा पुतळा । चौदा विद्या चौसष्ट कळा ।
जाणोनि राहे वेगळा । प्राकृताऐसा ॥ ७५ ॥
चौंदेहाचा केला अंत । प्रारब्धें देह वर्तत ।
ऊर्मि निमाल्या समस्त । हर्ष ना विषाद ॥ ७६ ॥
ताप न होई इतरांसी । इतरांपासोन जयासी ।
शांति नांदे अहर्निशी । अंतर्बाह्य ॥ ७७ ॥
ऐसेही भेटती कोणी । तेथें तेथें जावोनि ।
हस्तद्वय जोडोनि । म्हणे विवेकी बाळ । ७९ ॥
प्रश्न पाहोनि चकित होती । कांही वर्म जाणती ।
कांही उगेच उपहासिती । बालबुद्धि म्हणोनी ॥ ८० ॥
जे कां ज्ञानी भगवद्भक्त । ते म्हणती सद्‌गुरुपदांकित ।
होतां येतील समस्त । विद्या तुज ॥ ८१ ॥
पहा हो याची विरक्ती । शमदमादि संपत्ती ।
ज्ञान पाहतां वेडावती । थोर थोर ॥ ८२ ॥
कामक्रोधादि जिंकिले । गृहपाशही तोडिले ।
देहदंडण बहु केलें । अल्पवयीं ॥ ८३ ॥
दिसती तरी वज्रदेही । उन्मत्तपणा मुळीं नाही ।
बाल फिरे सकल मही । सद्‌गुरुपद शोधित ॥ ८४ ॥
काशीपासोन रामेश्वर । बहुत केली येरझार ।
तीर्थें क्षेत्रें समग्र । शोधिलीं गुरुकारणें ॥ ८५ ॥
रामेश्वरा अर्पिली गंगा । सेतु नेला प्रयागा ।
सप्तपुर्या ज्योतिर्लिंगा । चहूं धाम शोधिले ॥ ८६ ॥
मार्गीं फलाहार करावा । सिद्ध साधक धुंडावा ।
मुखीं रघुवीर गावा । ऐसा क्रम चालिला ॥ ८७ ॥
मार्गीं भेटले बहुत । मुमुक्षु साधक संत ।
कांहीं भेटींचे वर्णन येथ । करूं विशद ॥ ८८ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते चतुर्थाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय चवथा
समास दुसरा

ॐ नमो जी गुरुराया । अर्पितो तुझे चरणी काया ।
निरसावें या भवभया । ठाव देईं चरणांचा ॥ १ ॥
हृदयस्था आत्मयारामा । वर्णावयाची झाली सीमा ।
शेष थकला गातां महिमा । एक मुखें काय वर्णूं ॥ २ ॥
असो कृष्णा-वारणा संगमासी । हरिपूर क्षेत्र परियेसीं ।
तेथें राधाबाई नाम जिसी । भोळी भाविक सत्त्वस्थ ॥ ३ ॥
भजन जियेचें प्रेमळ । अन्नदानाचा सुकाळ ।
भक्तिभाव तो निर्मळ । संतसेवनीं सादर ॥ ४ ॥
मिरजग्रामीं आण्णाबुवा । लोकीं वेडा म्हणावा ।
अंतर्निष्ठांनी ओळखावा । सिद्धपुरुष ॥ ५ ॥
अनेक चमत्कारांसी दाखवी । लोककार्यें करावीं ।
पिशाचवृत्ती धरावी । वरिवरी ॥ ६ ॥
नाशिकप्रांतीं सटाणें गांव । तेथें मामलेदार देव ।
गृहस्थाश्रमी शुद्ध भाव । ज्ञानी असोनि विरक्त ॥ ७ ॥
भार्या जयाची सती । पतिव्रता गुणवती ।
उभयतां बहु प्रेम करिती । गणपतीवरी ॥ ८ ॥
जातां येतां काशीहूनि । सद्‌गुरु जाती नेमेंकरोनि ।
थोडे दिवस राहोनि । पुढें होती मार्गस्थ ॥ ९ ॥
जाणोनि हनुमदंश । मानिती भजती विशेष ।
प्रश्नोत्तरें दिवस दिवस । संवाद होत स्वानंदें ॥ १० ॥
जातीसी मिळतां जात । प्रेमें प्रेम दुणावत ।
सहजसमाधी येत । अनुभवासी ॥ ११ ॥
माणिकप्रभु हुमणाबादकर । ज्ञानी विरक्त योगेश्वर ।
शिष्यसमुदाय थोर । असे जयांचा ॥ १२ ॥
कांही दिवस केली वसति । प्रेमसंवाद चालती ।
रामभक्त जाणोनि चित्तीं । वंदन करिती समसाम्यें ॥ १३ ॥
सद्‌गुरु अक्कलकोटनिवासी । दत्तमहाराज म्हणती जयांसी ।
तेथें जाती दर्शनासी । दत्तअवतार मूर्तिमंत ॥ १४ ॥
कथिती ते रामोपासना । सद्‌गुरु भेटतील जाणा ।
अंतर्भाव जाणोनि खुणा । येरयेरां भेटले ॥ १५ ॥
आणिक बहु असती । जे गिरिगुहेमाजीं बसती ।
मनुष्यवाराही न घेती । ऐसे राहती अलिप्त ॥ १६ ॥
प्रसंगें श्रीगुरूंनी कथिलें । ते येथें विशद केलें ।
मार्गीं बहुत भेटले । सिद्ध आणि साधक ॥ १७ ॥
बहुत केल्या येरझारा । काशीहूनि रामेश्वरा ।
भरतखंड शोधिला सारा । सद्‌गुरुकारणें ॥ १८ ॥
कोणी म्हणती आम्हांसी । अधिकार नसे निश्चयेंसी ।
तुम्ही ज्ञानी गुणराशी । आम्हां गुरुसारिखे ॥ १९ ॥
कोणी ज्ञानी तपोबल । भूत भविष्य जाणोनि सकल ।
अवतारिक पुरुष हा केवळ । गुरु व्हावा कासया ॥ २० ॥
कोठें कांही कोठें कांही । मिळोनि समाधान नाहीं ।
तळमळ वाटे अंतर्बाही । विचरती भूमंडळी ॥ २१ ॥
सद्‌गुरुपद तें दुर्लभ । सहसा नव्हे प्राप्य लाभ ।
सुटतां संसृतीचा लोभ । ठायीं पडे ॥ २२ ॥
रुका अडका खर्चिला । सद्‌गुरु खरेदी केला ।
तरि बोध तैसाचि झाला । इह ना परत्र ॥ २३ ॥
धूर्त तार्किक विचक्षण । युक्तिप्रयुक्ती वेधिती मन ।
भोळे भाविक सज्जन । भुलविती अनेक ॥ २४ ॥
कामक्रोधा बळी पडले । अहंकारीं वैभवीं गुंतले ।
सिद्धिसाह्यें सुख मानिले । तेंही सद्‌गुरु म्हणविती ॥ २५ ॥
शाक्तमार्गें भरी भरती । भूतदयेतें नेणती ।
कोणी पिशाच भजती । भुलविती शब्दज्ञानें ॥ २६ ॥
वैभव पाहोनि भुलले । शब्दज्ञानें चकित झाले ।
आडमार्गीं जावोनि पडले । असंख्य नर ॥ २७ ॥
देवाहोनि आम्ही श्रेष्ठ । सेवा करा एकनिष्ठ ।
व्यसनी विषयीं झाले भ्रष्ट । भोंदिती जगा ॥ २८ ॥
नाही भक्ति नाहीं ज्ञान । नाहीं उपासना अनुसंधान ।
वैराग्य क्षमा समाधान । नाहीं भूतदया ॥ २९ ॥
समबुद्धि ना स्थिरत्व । नैष्कर्म्य ना जनप्रियत्व ।
निरहंकृति ना निस्पृहत्व । वंचकवृत्ती ॥ ३० ॥
नाहीं संदेह गेला । भूतीं भगवंत न देखिला ।
आशातंतु नसे तुटला । महंती प्रिय ॥ ३१ ॥
अंगी भरला ज्ञानताठा । यमनियमा दिधला फांटा ।
स्तुतिप्रिय झाला मोठा । अनुभवहीन ॥ ३२ ॥
ऐसे गुरु बहुत असती । बिकट प्रश्नें चडफडती ।
महंती जाईल म्हणोनि भिती । शिष्यगुंती काढिती ना ॥ ३३ ॥
ऐशियांचेनि सार्थक । होणार नाहीं निःशंक ।
स्वयें बुडोनि लोक । बुडविती निश्चयेंसी ॥ ३४ ॥ऐसे बहुत शोधिले । फिरत वाराणसीं आले ।
देखोनि तेथें शास्त्री भले । प्रश्न करिती नेमस्त ॥ ३५ ॥
शास्त्री वदती बाळा । गुरुविणें ज्ञानजिव्हाळा ।
न ये विद्या आणि कळा । यथासांग ॥ ३६ ॥
दक्षिणेसी मोगलाई । तेथें सद्‌गुरु तुकाई ।
शरण जाईं लवलाही । अनन्यभावें ॥ ३७ ॥
परिसोनि वचनासी । संतुष्ट झाले मानसीं ।
फिरले त्वरित दक्षिणेसी । विचार मानसीं दृढ केला ॥ ३८ ॥
तुकाराम साधु भले । येहळेगांवी ऐसें कथिलें ।
परिसतांची समाधान झालें । गणपतीचे ॥ ३९ ॥
बहुत पुरुष आजवरी । पाहतां फिरले पादचारी ।
परि समाधान ऐसेपरी । कधीं न झाले ॥ ४० ॥
आत्मा आत्मपणें एक । उपाधीनें दिसे अनेक ।
परि अनेक नव्हे एक । सर्वां भूतीं ॥ ४१ ॥
तोचि देतसे साक्ष । सूक्ष्मपणे देतां लक्ष ।
सत्यासत्य दावी पक्ष । विवेकीजना ॥ ४२ ॥
या अनुभवाच्या गोष्टी । विवेकी पाहती दृष्टी ।
इतर करिती चावटी । वितंडवादें ॥ ४३ ॥
असो झालें समाधान । चित्तासी बाणली खूण ।
त्वरित निघाले तेथोन । गुरुपदीं लीन व्हावया ॥ ४४ ॥
उतावीळ झाले चित्त । सद्‌गुरुभेटीची आर्त ।
वाटे वाट दुणावत । सत्वरीं ओसरेना ॥ ४५ ॥
धेनू आली वनांतोनि । धारेसी निघाला घरधनी ।
वत्सें धांव धरिली मनीं । परि बिरडें सुटेना ॥ ४६ ॥
ग्रामाहून आला पती । सासुरवासी भार्या सती ।
भेटी उतावीळ चितीं । वाटे गभस्ति मंद चाले ॥ ४७ ॥
तैसे श्रीसद्‌गुरुदर्शन । घ्यावया उतावीळ मन ।
जानव्हीचें स्नान करून । विश्वेश्वरदर्शन घेतलें ॥ ४८ ॥
तेथूनि निघे गुरुमाऊली । सद्‌गुरुभेटीसी चालिली ।
वय लहान असोन केली । करणी हे अघटित ॥ ४९ ॥
सद्‌गुरुभेटीची आयती । केली कैसी पाहावी ती ।
चित्तशुद्धि अनुतापस्थिति । वैराग्ययुक्त ॥ ५० ॥
मायमोह पितृमोह । खेळगडी यांचा मोह ।
आप्तइष्ट-गृहमोह । शरीरमोह सांडिला ॥ ५१ ॥
अयाचित उदरभरण । फलाहार उपोषण ।
रसनेंद्रिय जिंकले संपूर्ण । अजिंक्य जें ॥ ५२ ॥
कोठेंही करावी वसती । ग्रामीं अथवा वनाप्रति ।
प्रावरणाविण वागविती । देह आपुला ॥ ५३ ॥
शीतोष्ण वारा पाऊस । सोसतां न मानी त्रास ।
वैराग्यस्थिति जयास । पूर्णत्वें बाणली ॥ ५४ ॥
आशा ममता देहबेडी । लोभ मोह वासना कुडी ।
भय अहंकार वर्हाडी । घालविले सकळ ॥ ५५ ॥
मुखीं अखंड रामनाम । तेणें चित्तशुद्धि होय परम ।
ध्यानी एक श्रीराम । भोग्य वस्तू टाकिल्या ॥ ५६ ॥
माझें घर माझा संसार । माझीं मायबापें चतुर ।
माझी जन्मभूमि थोर । शहाणा एक मीच मी ॥ ५७ ॥
माझें धन माझें शेत । माझे खेळगडी बहुत ।
आप्तइष्ट गणगोत । सर्वही माझें ॥ ५८ ॥
माझें हे ओझें समस्त । विवेकें विवरी सतत ।
असत्य मानोनि शोधी सत्य । सद्‌गुरुपाशीं ॥ ५९ ॥
न इच्छी विषयभोगांसी । विषसम जाणोनि त्यांसी ।
अलिप्त राहे उदासी । आवडी एक नामाची ॥ ६० ॥
परि रामदर्शन करवी । ऐसा न मिळे गोसावी ।
अखंड तळमळ लागली जीवीं । वैराग्ययुक्त ॥ ६१ ॥
अनुतापेंहोवोनि विरक्त । विवेक जागविला सतत ।
नामस्मरणानें होत । चित्तशुद्धि ॥ ६२ ॥
मुमुक्षुस्थिति अनुभविली । साधकवृत्ति अंगीकारिली ।
सद्‌गुरुभेटीसी चालली । माय माझी ॥ ६३ ॥
जे उपजत ज्ञानघन । आदिमध्यांत अविच्छिन्न ।
जनांसी लावावया वळण । जनरूढी चालती ॥ ६४ ॥
असो गणपति बाळ । ओलांडोनि रानोमाळ ।
पाहावया सद्‌गुरु दयाळ । सत्वर चालिले ॥ ६५ ॥
पावले मोगलाईंत । येहळेगांव कोठें पुसत ।
संकेतें पावले जेथ । तुकाराम नांदत ॥ ६६ ॥
बाळ चातक ज्ञानाधिकारी । स्वानंदमेघ वरुषेल वरी ।
सद्‌गुरुकृपेचिया सरी । तन्निमित्तें सेवन करूं ॥ ६७ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते चतुर्थाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय चवथा
समास तिसरा

येहळेगांवी पावले । ग्रामस्थांसी पुसिलें ।
तुकाराम साधु भले । कोठें भेटतील मजलागीं ॥ १ ॥
कोणी म्हणती नसे ठावा । कोणी म्हणती रानीं पहावा ।
वेडा तुका कासया हवा । म्हणती कोणी ॥ २ ॥
कोणी म्हणती साधु भले । तुमचें भाग्य उदेलें ।
दर्शना चित्त वेधलें । वय दिसतसे कोमल ॥ ३ ॥
कोठेंतरी आडरानीं । अथवा ओढ्याचे ठिकाणीं ।
बैसले असतील, शोधोनि । काढीं बापा ॥ ४ ॥
असतील कंकणें हातांत । श्वान बालकांसवे खेळत ।
चिलीम करीं वागवीत । असतील पहा ॥ ५ ॥
भूमीची शेज तयांसी । आकाश प्रावरण परिधानासी ।
मस्तकीं टोपडे घालिती हर्षीं । बालकाऐसें ॥ ६ ॥
सर्वज्ञ परि बाह्य वेडा । दिसेल तुम्हांसी तुसडा ।
देह मलिन उघडा । वागवित नित्य ॥ ७ ॥
खूणगांठ बांधोनि । बाळ निघाला तेथोनि ।
सत्वर काढिले शोधोनि । परमहंस ॥ ८ ॥
दुरूनि ध्यान पाहिलें । तंव अष्टभाव दाटले ।
मग देहासी लोटिलें । सद्‌गुरुचरणी ॥ ९ ॥
कंठ सद्‌गदित झाला । प्रेमपान्हा नयनी आला ।
सर्वांगीं रोम थरारला । कृपाकटाक्षें ॥ १० ॥
सहस्रबाण सोडिले जरी । न मरे वासना आसुरी ।
कृपाकटाक्षें एके शरीं । सहकुटुंबे निमालीं ॥ ११ ॥
दशेंद्रियांसहित मन । सोडोनि बाह्य विषयस्फुरण ।
सद्‌गुरुपदांसी आकलन । कराया धांवले ॥ १२ ॥
परि झालें विपरित । गुरुपदींच लीन होत ।
आपलेपण विसरोनि जात । ऊर्मीची धांव खुंटली ॥ १३ ॥
जैसे मीन चहूं दिशीं । ग्रासूं धांवती गळासी ।
तंव ते गळचि गुंतविती तयांसी । बाह्यगति रोधोनि ॥ १४ ॥
तैशीं इंद्रियें लीन झालीं । गुरुपदें गुंतोनि गेलीं ।
विषयग्रहणीं खुंटली । गति ज्यांची ॥ १५ ॥
चंचलत्व मनाचें गेलें । अनन्यत्वें चरण वंदिले ।
हस्त जोडोनि उभे ठेले । दृष्टी नम्र जाहली ॥ १६ ॥
तुकाराम आनंदमूर्ति . ज्ञानदृष्टीं पाहती ।
जाणोनि अंतर्बाह्यस्थिति । कार्यकर्ता सिद्धपुरुष ॥ १७ ॥
लोकव्यवहार कारण । ध्यानीं आणोनिया जाण ।
मौन धरिलें आपण । तुकाईनें ॥ १८ ॥
बाळ बोले जी महाराज । शिकावें वेदशास्त्राचें बीज ।
ऐसे कथिलें मज । कुलगुरूंनीं ॥ १९ ॥
वेदशास्त्रें तीं अपार । अल्पायुषीं न पडे पार ।
भवसिंधु दुर्गम थोर । उतरावा कैसा ॥ २० ॥
सप्रेम बोले तुकाई । गुरुकृपा होतां पाही ।
अज्ञेय नुरे स्वल्पही । ज्ञानरूप होशील ॥ २१ ॥
सहज बोलोनि उत्तरा । चटका लाविला अंतरा ।
सिद्धांच्या लीला अवधारा । कशा असती ॥ २२ ॥
गणपति करी विनवणी । अनुग्रहप्रसाद द्यावा झणीं ।
जेणें भेटेल चक्रपाणी । भवगजपंचानन ॥ २३ ॥
अधिकारी ऐसे जाणोनि । राममंत्र दिधला त्यांनी ।
गुरुपरंपरा कथोनि । समाधान केलें ॥ २४ ॥
ती परंपरा ऐसी । आदिनारायण मूळाशीं ।
तो उपदेशी श्रीविष्णूसी । विष्णु उपदेशी हंसातें ॥ २५ ॥
हंसाचा शिष्य ब्रह्मदेव । वसिष्ठ ब्रह्मापासाव ।
ते उपदेशिती रामराव । एकपत्नी एकबाणी ॥ २६ ॥
रामें उपदेशिले रामदास । रामदास उपदेशिले कल्याणास ।
कल्याणें बाळकृष्णास । कृपाप्रसाद अर्पिला ॥ २७ ॥
चिंतामणि जाहले तेथूनि । रामकृष्णही वदती कोणी ।
तुकारामा भगवद्भजनीं । रामकृष्णें लाविलें ॥ २८ ॥
तयापासोनि ब्रह्मचैतन्य । सद्‌गुरु बोधिले आनंदघन ।
परंपरा करितां श्रवण । रामभक्ति जडतसे ॥ २९ ॥
रामदास सामर्थ्यें समर्थ । होवोनि ठेले विख्यात ।
समर्थसंप्रदाय ऐसें वदत । तैंपासोनी ॥ ३० ॥
त्रयोदशाक्षरी रामनाम । वेदशास्त्राहूनि परम ।
जेणें पावती विश्राम । साधकजन ॥ ३१ ॥
जें वंदिलें शिवांनी । तेथें मानावा कोण गणी ।
सद्‌भावें ठेवितां ध्यानीं । रामभेटी होतसे ॥ ३२ ॥
साह्य करी हनुमंत । दुष्टांनिंदकां निवारित ।
भजनीं सदा प्रेम देत । आशीर्वाद संतांचा ॥ ३३ ॥

अनंतजन्मींचें भाग्य । असेल तरीच घडे हा योग ।
ना तरी संसृतीचा भोग । सुटेना कीं ॥ ३४ ॥
असो ऐसा अनुग्रह झाला । गणपतिहृदयीं बिंबला ।
बहुतांचे उपयोगा आला । भवसिंधु तराया ॥ ३५ ॥
पुन्हां धरिलें मौन । रानींवनीं करिती भ्रमण ।
गणपति सोडीना चरण । सदा सन्निध वास करी ॥ ३६ ॥
देहाची कींव सांडिली । गुरुसेवा आदरिली ।
चरणीं वृत्ति लिगडली । लोहचुंबकासारखी ॥ ३७ ॥
गुरुसेवा अति गहन । गहन तितुकी सधन ।
देहाचें करोनि उपकरण । मन मुरडिलें सेवेकडे ॥ ३८ ॥
एके दिनीं मिळे अन्न । एके दिनीं उपोषण ।
तृष्णा क्षुधा हें बंधन । तोडिलें मर्त्यलोकींचें ॥ ३९ ॥
वस्त्रप्रावरण आकाश । तृण भूमि शय्येस ।
ज्ञानज्योतीचा प्रकाश । तेणें कष्ट न वाटे ॥ ४० ॥
जिकडे गुरु धांवती । तिकडे धांवावे शीघ्रगती ।
झाडोनि ठेविती क्षिती । बैसावयाकारणें ॥ ४१ ॥
गुरु बैसलियावरी । प्रेमभरें चरण चुरी ।
मौन धरिलें बाहेरीं । अंतरीं ध्यान श्रीगुरूंचें ॥ ४२ ॥
श्रीगुरु हेचि प्रंचप्राण । गुरुआज्ञा वेदवचन ।
तयावांचोन आन स्थान । न देखे तिळभरी ॥ ४३ ॥
गुरुहूनि आन दैवत । न देखे त्रिभुवनांत ।
धन्य धन्य गुरुपूत । देव धांवती दर्शना ॥ ४४ ॥
सोडोनिया विषयगुंती । इंद्रियें गुरुसेवेकडे धांवती ।
सेवेवांचोनि अन्यप्रवृत्ति । गोड न वाटे ॥ ४५ ॥
कमल एक भुंगे अनेक । सर्वत्र धांवती तात्कालिक ।
इंद्रियभ्रमर वेगें अधिक । धांवती गुरुपदाब्जीं ॥ ४६ ॥
मन चंचल अनिवार । परि रिघालें सद्‌गुरुघर ।
चंचलस्थिति गेली दूर । ठायींच उन्मन झालें ॥ ४७ ॥
चित्त चिंती गुरुवर । बुद्धि स्थिर झाली चतुर ।
गेला समूळ अहंकार । परम लीनता बाणली । ४८ ॥
वासना इच्छी चरणरज । तृष्णा धरी सद्‌गुरुकाज ।
अनन्यपण सहजीं सहज । गुरुपदीं जाहलें ॥ ४९ ॥
क्वचित्काळीं सेवा घेती । क्वचित् झिडकारोनि देती ।
दुरुत्तरें बोलोनि पाहती । निष्ठा सच्छिष्याची ॥ ५० ॥
क्वचित् गुणां वानावें । क्वचित् तृणतुल्य करावें ।
हर्षविषादाचे गोवे । घालिती अनेक ॥ ५१ ॥
परि मान ना अपमान । लोभग्रस्त नोहे मन ।
गुरुपदीं गेले रंगोन । रिघाया दुजा ठाव नाहीं ॥ ५२ ॥
धक्के चपेटे मारिती । अहंभूता निवारिती ।
सद्‌गुरु सच्छिष्याप्रति । स्थापिती निजपदावरी ॥ ५३ ॥
अनंत सुकृतांची ठेव । असतांचि गुरुपदें भाव ।
दुर्लभ दुर्लभ, आड माव । ठायीं ठायीं पडतसे ॥ ५४ ॥
सद्‌गुरुवचनी अढळ विश्वास । तोचि साक्षात ब्रह्मरस ।
गुरुपूत म्हणावें तयास । त्रैलोक्यवंद्य ॥ ५५ ॥
गुरुवचनी विकल्प धरी । तो जाण अनधिकारी ।
चौर्यांशी लक्ष फेरी । चुकणार नाही ॥ ५६ ॥
असो सद्‌गुरुसेवा गहन । गणपति करी रात्रंदिन ।
देवादिकां दुर्लभस्थान । उपभोगी जो ॥ ५७ ॥
तुकाराम परमहंस । दुर्गमस्थळीं वनीं वास ।
सेवा कठिण बहुवस । विचारा मनीं ॥ ५८ ॥
ऐसे तुकाराम संत । परमहंस विरक्त ।
अनन्यपणे भगवद्भक्त । निःसंदेही ॥ ५९ ॥
लोकीं वागती वेड्यापरी । ‘वेडा तुका’ म्हणती सारीं ।
भाविकां नवसा सत्वरी । पावती नित्य ॥ ६० ॥
बहुत लोक दर्शना येती । कोणासवें न बोलती ।
बोलिल्या अर्थव्युत्पत्ति । प्राकृता न कळेचि ॥ ६१ ॥
कोठेंही फिरत असावे । श्वान-बालकासींच खेळावें ।
कोठेंही खावें जेवावें । बंधन नाही ॥ ६२ ॥
नानापरींचे नवस । नागरिक बोलती तुकयास ।
शीघ्र पावे तयांस । संकटकाळीं ॥ ६३ ॥
पुत्रप्राप्तीची हांव जया । त्या नवस करिती बाया ।
म्हणती मजला पुत्र झालिया । तुक्याकरवीं कान टोचूं ॥ ६४ ॥
कोणाची मुलें न वांचती । ते नाककान टोंचविती ।
काकुळतीनें शरण येती । पुत्र वाचूं दे आमुचा ॥ ६५ ॥
व्याधिग्रस्त कितीएक । मानसिक कामना अनेक ।
पुरवोनि दाविती कौतुक । चमत्कृति जगामाजीं ॥ ६६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते चतुर्थाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय चवथा
समास चवथा

सद्‌गुरु श्रीतुकाराम । उपदेशिती भक्त परम ।
अनंत पावती विश्राम । तुकाईपाशी ॥ १ ॥
शाहाण्यासी अंतर न देत । भाविकांसी सफल होत ।
अनन्यासी तारित । भवसिंधुपासोनि ॥ २ ॥
विकल्पी विकल्प करिती । मूर्ख लोक वेड्या भजती ।
मत्सर निंदा आपुले मतीं । करिती कितीएक ॥ ३ ॥
एकदां एक चमत्कार । झाला तो करूं विस्तार ।
गोचरस्वामी उंबरखेडकर । गुरुबंधु तुकाईचे ॥ ४ ॥
गोचर म्हणाया कारण । धेनूपरि अन्नग्रहण ।
हस्तस्पर्श न करिती जाण । मुखानें आहार करिती ते ॥ ५ ॥
परम विरक्त संन्यासी । परि सगुणोपासना आनंदेसीं ।
मठीं राहती सुखेंसी । मुमुक्षुजनां बोधाया ॥ ६ ॥
एके समयीं ऐसें झाले । मठीं ब्राह्मण भोजना बैसले ।
कर्मठपणें भरीं भरले । अंतरस्थिति नेणती ॥ ७ ॥
गोचरस्वामी भक्त परम । प्रसाद देवादिकां दुर्गम ।
तंव पावले तुकाराम । अकस्मात त्या ठायीं ॥ ८ ॥
स्वामींस झाला आनंद । धांवोनि धरिले पद ।
विनविती सेवावा प्रसाद । परमानंदें ॥ ९ ॥
उभयतांही गुरुभक्त । विवेकीं ज्ञानी विरक्त ।
भेटीचा आनंद येथ । वर्णितांही पुरेना ॥ १० ॥
एखादा विदेशी नर । पाहे भिन्न आचार ।
देशबंधु मिळतां निर्धार । औदासिन्य मावळे ॥ ११ ॥
तैसे जगीं संत वर्तती । परि अंतर कोणी नोळखती ।
ओळखीऐसी भेटतां जाति । सहज प्रेम उफाळे ॥ १२ ॥
बैसविले अत्याग्रहें । वाढावयाची चालली घाई ।
विप्र म्हणती हें काई । स्वामी आरंभिलें ॥ १३ ॥
येर येरांकडे पाहती । हळूंच नेत्रें खुणाविती ।
भ्रष्ट तुका आला विप्र म्हणती । नाकें मोडूं लागले ॥ १४ ॥
स्वामींचे भिडे बोलवेना । आणि धीरही धरवेना ।
द्विज तामसी जाणा । मनीं जाहले संतप्त ॥ १५ ॥
म्हणती हा वेडा तुका । आचारभ्रष्ट असे निका ।
भटकतो रानीं वनीं देखा । कर्महीन ॥ १६ ॥
केवळ जातीचा ब्राह्मण । न करी संध्यावंदन ।
स्वामी जाणते ज्ञानघन । परि आजीं वेडावले ॥ १७ ॥
ऐसा मनीं विकल्प आला । नोळखिती ब्रह्मपदाला ।
श्रींनी भाव जाणिला । उठोनि गेले ॥ १८ ॥
तुका गेला बरें झालें । औषधाविना नायटे गेले ।
आतां सुग्रास अन्न वहिलें । जेवूं आकंठपर्यंत ॥ १९ ॥
आनंद मनीं मानिती । स्वामी सकळही जाणती ।
अनुभव येईल तयांप्रति । साधुनिंदेचा ॥ २० ॥
तंव झाला चमत्कार । पक्वान्नासी सुटलें नीर ।
किडे बुजबुजले फार । पात्रांमाजी ॥ २१ ॥
आश्चर्य करिती सारे । आजि आमुचें दैव न बरें ।
स्वामींसी कथिती त्वरें । अशुभवार्ता ॥ २२ ॥
स्वामी वदती तयांप्रती । तुम्ही विकल्प आणिला चित्तीं ।
तोचि फळा आला निश्चितीं । करावे तैसें भरावें ॥ २३ ॥
तुकाराम साधु भला । परमहंसपद पावला ।
त्याचा तुम्हां वीट आला । म्हणोनि ऐसें जाहलें ॥ २४ ॥
ज्यानें स्वधर्म जाणला । जाणोनि स्वस्वरूपाला ।
तदाकार होवोनि ठेला । त्यासी म्हणतां अपवित्र ॥ २५ ॥
ब्रह्म जाणे तो ब्राह्मण । ऐसें वेदश्रुतीचें वचन ।
तुम्ही सांगा कांही खूण । अल्पस्वल्प ॥ २६ ॥
जो ब्रह्मानंदी निमग्न । भूतीं भाव नसे भिन्न ।
तयासि लावितां दूषण । विरक्त निःसंदेही ॥ २७ ॥
जें अगोचर वेदांसी । तेंचि गोचर जयासी ।
कर्मबंधन नसे त्यासी । सत्य सत्य ॥ २८ ॥
जो ब्रह्मानंदी तल्लीन । त्याचीं कर्में करायालागोन ।
ऋषि ठेविले स्थापोन । भगवंतांनी ॥ २९ ॥
जो श्रेष्ठ समबुद्धि । आपपर भाव नसे कधीं ।
देह चाले सहजसमाधीं । मध्यें जयाचा ॥ ३० ॥
ऐसा जो भगवद्भक्त । परमहंस परम विरक्त ।
तुमचे मनीं विकल्प प्राप्त । अज्ञानें जाहला ॥ ३१ ॥
जया अज्ञेय नसे कांहीं । अंतर्भाव जाणोनि जिहीं ।
चमत्कृति दावाया पाहीं । उठोनि गेले ॥ ३२ ॥
तुम्ही जावोनि सत्वरी । विनवोनि आणा पात्रावरी ।
मग सुखें भोजनें बरीं । सुग्रासेंसी करावी ॥ ३३ ॥
विकल्प आणिला मनांत । म्हणोनि मानूं नका किंत ।
साधु क्षमा मूर्तिमंत । जगाची माय ॥ ३४ ॥
स्वामींचे वचन प्रमाण । मानोनिया विप्रगण ।
धुंडिती सकळही वन । सत्वरेंसी ॥ ३५ ॥
तंव पाहिले अकस्मात । धांवोनि चरण धरित ।
अन्याय झाला बहुत । क्षमा करीं महाराजा ॥ ३६ ॥
अल्पबुद्धि जन आम्ही । विकल्प आला जी स्वामी ।
क्षमा करोनि चला धामीं । भोजन आम्हां घालावें ॥ ३७ ॥
उठते झाले हास्यवदनीं । तुकाराम सिद्ध ज्ञानी ।
बैसले मठीं जाऊनि । आनंदी आनंद बहु केला ॥ ३८ ॥गोचरस्वामी आणि शेवाळकर । दोघे गुरुबंधु साचार ।
भक्त अनेक किंकर । लागती श्रीचरणीं ॥ ३९ ॥
दत्त उपास्य दैवत । संप्रदाय श्रीएकनाथ ।
ऐक्यरूप होवोनि वर्तत । असती जगामाजीं ॥ ४० ॥
आशंका घेतील कोणी । नाथसंप्रदाय म्हणोनि ।
तरी परिसावी कहाणी । झाली कैसी ॥ ४१ ॥
चिंतामणिबुवा संत । होते पूर्वीं दत्तभक्त ।
विठ्ठलचैतन्य तयां वदत । होते पूर्वीं गृहस्थाश्रमीं ॥ ४२ ॥
संन्यासग्रहणाचे वेळी । भेटली बाळकृष्ण माऊली ।
रामउपासना तेव्हां दिली । चिंतामणि गुरुनाम ॥ ४३ ॥
तैंपासोनि उपासना । दोनी चालविल्या जाणा ।
तुकारामें दत्तउपासना । बहुतांस दिली ॥ ४४ ॥
सद्‌गुरुकारणें केवळ । ठेव होती जी जवळ ।
रामभक्त जाणूनि निश्चळ । हातीं दिली ॥ ४५ ॥
तिघे गुरुबंधु जे कां । वडील मानिती त्यांतील तुका ।
गोचरस्वामी दुजे देखा । तिजे रावसाहेब शेवाळकर ॥ ४६ ॥
तिघांसी मानिती देवांश । ब्रह्मा विष्णु महेश ।
तुकाराम वैराग्यें उदास । श्मशानवासी म्हणती तया ॥ ४७ ॥
तुकाराम परमहंस विरक्त । गोचरस्वामी संन्यासव्रत ।
रावसाहेब शेवाळकरपंत । गृहस्थाश्रमी ॥ ४८ ॥
तयांची ऐसी साधनपद्धती । विप्रगृहीं पाणी भरिती ।
भगवद्रूप मानोनि अतिथी । भोजन देती अत्यादरें ॥ ४९ ॥
गोचरस्वामी संन्यासी । मठीं राहती नेमेंसी ।
तुकाराम अरण्यवासी । परमहंस म्हणती तयां ॥ ५० ॥
ऐसे तुकाराम संत । गणपति पदें लागत ।
रात्रंदिन सेवा करित । देहासक्ति सांडोनी ॥ ५१ ॥
जें देतील तें खावें । सांगतील तें ऐकावें ।
सदा सन्निध असावें । अनन्यरूप ॥ ५२ ॥
गुरुसेवेची महिमा । वर्णूं न शकेचि ब्रह्मा ।
आड येती अणिमा गरिमा । अष्ट महासिद्धी ॥ ५३ ॥
कामना वासना कल्पना । लोभ मोह लोकेषणा ।
चंचल मन कामेषणा । वित्तेषणा आडवी ॥ ५४ ॥
कुलअहंता ज्ञानअहंता । साधकां नाडिती क्षण न लागतां ।
इतुकियासी मारोनि लाथा । गुरुपदीं रमतसे ॥ ५५ ॥
सालंकार बालकासी । तस्कर देती खावयासी ।
भुलोनि जातां तयांसरसी । सर्वस्व हरतील ॥ ५६ ॥
पारधी अमिषा दाखवित । फसतां पाशीं गोंवित ।
सच्छिष्य गुरुपदांकित । आन नेणें ॥ ५७ ॥
इंद्रराज्य आलें हातां । अथवा हरि होय प्रार्थिता ।
तरी सद्‌गुरुवांचोनि तत्वतां । आवड नसे लोकत्रयीं ॥ ५८ ॥
हीनाहून हीन व्हावें । तैं गुरुभक्ति दुणावे ।
मन चित्सुखे भोगावें । सर्वकाळ ॥ ५९ ॥
नीच सेवा गुरुगृहीं । निरहंकार करितां पाहीं ।
जगीं दुर्लभ नसे कांही । जगद्वंद्य ॥ ६० ॥
पूर्वपुण्याची असे ग्रंथी । तरीच घडे गुरुभक्ति ।
गुरुभक्तीची महती । वर्णिली न वचे ॥ ६१ ॥
गुरुवचन तो वेदांत । गुरुसेवा हा धादांत ।
गुरुकृपा तोचि सिद्धांत । गुरुपुत्रासी ॥ ६२ ॥
प्रस्तुत गुरुशिष्यांचे बंड । वाढलें बहुत पाखांड ।
ज्ञान नीति श्रद्धा जाड । एक उणें एक पुरें ॥ ६३ ॥
संदेहरहित सद्‌गुरु । निरहंकारी शिष्यवरु ।
वेदप्रणीत साधनाचारु । त्रिवेणीसंगम अपूर्व हा ॥ ६४ ॥
समुद्रामाजीं लवणोदक । धात्रीफळ पर्वतीं देख ।
चतुरें करितां एक । गोडी होत अपूर्व ॥ ६५ ॥
परि सद्‌गुरु भेटे विरळा । मिळतां शिष्य गोंवळा ।
मग सर्वही घोटाळा । अनेक जन भांबावती ॥ ६६ ॥
अर्धहळकुंडे पिवळे झाले । साधन सांडून गुरु बनले ।
मग आल्या संचितासी मुकले । महंतीमुळें ॥ ६७ ॥
अज्ञानी जीव स्तुति करिती । साधकां त्वरें नाडिती ।
जोंवरी नसे आत्मप्रचीति । तोंवरी महंती न धरावी ॥ ६८ ॥
महंतीनें सुख वाटे । वर्म काढितां दुःख मोठें ।
अंतरीं असमाधान कांटे । अहंतेचे टोंचती ॥ ६९ ॥
ऐसी महंतांची दशा । पाहतां येतसे हंशा ।
प्रेमतंतूचा वळसा । तुटोनि गेला ॥ ७० ॥
याकारणें निःसंदेह स्थिति । जोंवरी न ये आत्मप्रचीति ।
तों न धरावी महंती । वाटमारू ॥ ७१ ॥
सिद्धि महंती अहंता । साधकां नाडिती जातां येतां ।
अधोगतीस तत्वतां । नेऊनि घालिती ॥ ७२ ॥
याकारणें अंतरी । सावध असावें चतुरीं ।
स्वयें चुकवावी फेरी । जन्ममृत्युची ॥ ७३ ॥
अज्ञजनीं स्तोत्र केलें । तेथें काय हातां आलें ।
तेचि निंदतील भले । सावध असावें ॥ ७४ ॥
असो गणपति अति दक्ष । गुरुपदीं सदा लक्ष ।
गुरुकृपेवांचून पक्ष । दुजा नाहीं ॥ ७५ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ७६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते चतुर्थाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय पाचवा
समास पहिला

तपें तोषला सद्‌गुरु ज्ञानियांचा । वदे वाढवीं पंथ या राघवाचा ॥
कलीमाजिं मंदावली धर्मभक्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ५ ॥

जयजय सद्‍गुरु परंपरा । वंदन करूं जोडोनि करां ।
मुमुक्षुजनां आसता । उपकार किती वानावे ॥ १ ॥
भूमिस्थित गुप्त ठेवा । वरी बैसोन नसे ठावा ।
आयता काठोनि हातीं द्यावा । ऐसें केलें ॥ २ ॥
अज्ञान भरलें शीत । अंग थरथरां कांपत ।
कटकटा वाजती दंत । मायामोहें ॥ ३ ॥
ज्ञानाग्निस्फुल्लिंग चेतविले । प्रगट करोनि दाविलें ।
शीत वारोनि सुखी केलें । बहुतांसी ॥ ४ ॥
पूर्वप्राप्त निधान । जवळी असोनि चुकलें जाण ।
आड पाडिले झांकण । सगुणत्वाचें ॥ ५ ॥
सगुणींच दाविलें निर्गुण । भ्रमाचें फेकोनि झांकण ।
सक्षात्कारें समाधान । दिधलें तुम्हीं ॥ ६ ॥
दया उपजोनि पोटीं । ईश्वरें मानवहितासाठीं ।
दिधली जी निधानपेटी । तुमचे हातीं ॥ ७ ॥
जतन करोनि ठेविली । प्राणापरिस सांभाळिली ।
बहुतांचे उपेगा आली । भवदारिद्र्य हरावया ॥ ८ ॥
जें शिवें आदरिलें । जहर विष शमविलें ।
नित्य समाधान लाभलें । चिंतनें जयाच्या ॥ ९ ॥
कितीएक जीवन्मुक्त झाले । देहीं असोनि विदेही बनले ।
कोणी राम होवोनि गेले । सायुज्यासी ॥ १० ॥
भक्तपणें विभक्त कोणी । राहिले सुखें सुखावोनि ।
कोणी नामरूप विसरोनि । चैतन्यचि जाहले ॥ ११ ॥
कित्येक ते विरक्त । जगीं वर्तती पिशाचवत् ।
कदापि न लागों देती अंत । कोणासही ॥ १२ ॥
कोणी झाले ब्रह्मवेत्ते । देव वंदिती जयांते ।
अभिमानरहित क्रोधापरते । दयाशांतेचे पुतळे ॥ १३ ॥
कोणी झाले सत्ताधारी । दुर्जन पळविले दुरी ।
सज्जनांचे साह्यकारी । होवोनि गेले ॥ १४ ॥
कोणी रामभक्तीची गुढी । उभारिली दोहीं थडी ।
इहपर स्वानंदगोडी । चाखिली सहज ॥ १५ ॥
कोणी लिहिलें अध्यात्म । गुह्यातीत गुह्य परम ।
तरोनि गेले बहु दुर्गम । भवसिंधु श्रवणमननें ॥ १६ ॥
कोणी ब्रह्मानंदीं निमग्न झाले । ब्रह्मचर्य आदरें पाळिले ।
षडूर्मींचे हवन केले । शांतिकुंडी> ॥ १७ ॥
ऐसे तरले कितीएक । तरती, तरतील अनेक ।
जें चिंतनीय वासनाच्छेदक । परमसार ॥ १८ ॥
तेंचि दिधलें दीनाहातीं । जेणें घडे अनन्यभक्ती ।
तन्मयता चित्तशांती । प्राप्त होय ॥ १९ ॥
कैसें करणीचें लाघव । मावळविती समूळ माव ।
मीपणासी नुरे ठाव । द्विअतभाव हरोनी ॥ २० ॥
जेथें वेद मंदावे । शास्तांचे विचार थकले ।
उपनिषदें घुसळोनि पाहिलें । तरी वेगळें दिसेना ॥ २१ ॥
ऐसा तो स्वानंदघन । सच्छिष्या दिधला जाण ।
पतित केले पावन । दयादृष्टी ॥ २२ ॥
तयासी करोनि वंदन । पंचमाध्याचें विवरण ।
जें असे अत्यंत गहन । तें बोलूं गुरुकृपें ॥ २३ ॥
चतुर्थाध्यायाचे अंती । गुरुसेवा केली जी ती ।
परिसतां वाढे गुरुभक्ती । भाविकांची ॥ २४ ॥
पंचमी सहजानंद । गुरुशिष्या ऐक्यपद ।
जगदुद्धाराचा अनुवाद । पडेल श्रवणी ॥ २५ ॥
असो चालली अखंड सेवा । सत्संगतीचा सेविती मेवा ।
विषयोर्मींचा सुटला गोवा । सहजसमाधि बाणली ॥ २६ ॥
पाहुनियां साधनस्थिति । सद्‍गुरु संतुष्ट होती ।
मग जीवींचे गुह्य कथिती । ज्ञानदृष्टि चेवोनि ॥ २७ ॥
मतकींची ऊ काढोनि । हातीं दिधली तयांनी ।
श्रीरामा वसिष्ठांनीं । दिधले तेंचि तुज देतो ॥ २८ ॥
पुरपि काढोनि एक । हातीं देती देख ।
सांदिपनें यदुनायक । बोधिलें तेंचि घेईं बा ॥ २९ ॥
विकल्प विचार न करितां गुरुप्रसाद वंदिला माथां ।
संतुष्ट झाला गुरुदाता । अनन्यभाव पाहोनी ॥ ३० ॥
विवेकयुक्त वैराग्य । साधन साधी अव्यंग ।
ऐसा सच्छिष्य सभाग्य । मिळतां गुरु संतोषे ॥ ३१ ॥
जो आळसा न देईं अंग । गुरुवचनीं श्रद्धा चांग ।
गुरुकृपा व्हावया मग । उशीर नाहीं ॥ ३२ ॥
गुरुवचनीं विकल्प धरी । तो शिष्य नव्हे, आपुला वैरी ।
क्षीर टाकोनि करी । मदिरापान जैसा ॥ ३३ ॥
गुरूचें जाणे अंतर । ऐसा दुर्लभ नर ।
जो पावे पैलपार । ऐसा विरळा ॥ ३४ ॥
बहुतेकीं गुरु केले । म्हणती गुरुमुख पाहिजे झालें ।
ऐसें वेदशास्त बोलिलें । ठायीं ठायीं ॥ ३५ ॥
जन्मा आलियाचें सार्थक , एकदां करावें गुरुमुख ।
लौकिक व्यवहार मानिती देख । तेही गुरुभक्त म्हणविती ॥ ३६ ॥
कोणी म्हणती गुरु करावा । म्हणजे प्रपंच चाले बरवा ।
संकटकालीं आठवावा । म्हणजें बरें ॥ ३७ ॥
कित्येक गुरु केला । अनन्य शरण नाहीं गेला ।
सेवा अक्रितां लाजला । तोही शिष्य म्हणवीतसे ॥ ३८ ॥
कित्येक गुरूसी वंचिती । प्रसंगें सेवा न करिती ।
प्राणासवें रक्षिती । आपुलें धन ॥ ३९ ॥
कोणी म्हणती हा गोसावी । कारणिक संगति करावी ।
नाहीं तरी कुळाची थोरवी । जाईल आमुची ॥ ४० ॥
कोणी म्हणती हा भाग्यवंत । याचे संगें राहतां नित्य ।
मिष्टान्नें सेवितां तृप्त । होऊं आम्ही ॥ ४१ ॥कित्येक म्हणवाया संत । गुरु करिती त्वरित ।
झालों आतां पुनीत । पूर्ण ज्ञानी ॥ ४२ ॥
गुरुभक्तीचे नांवाखाली । कित्येकीं दुष्कर्में झांकिली ।
अद्वैताची बोलती बोली । म्हणती आम्ही परमहंस ॥ ४३ ॥
स्वानुमतें मुक्त झाले । आणि संदेहचक्रीं भ्रमले ।
भ्रष्टाकारें कुडे झाले । कितीएक ॥ ४४ ॥
निर्हेतुक गुरुभक्ति । निर्विकल्प ज्यांचि वृत्ति ।
आवडी सतीसी पती । जेवीं तैसी ॥ ४५ ॥
सर्वस्व अर्पिले गुरूसी । तोचि अधिकारी मोक्षासी ।
लाजवी महासिद्धीसी । सिद्धपुरुष ॥ ४६ ॥
गुरुचें करितां गुणश्रवण । सर्वेंद्रियांचे करी कान ।
जैसा चातक घे झेलोन । मेघोदक ॥ ४७ ॥
काळवेळ जाणवेना । श्रवणीं आवडी लागली मना ।
अखंड चालवी भजना । गुरुगुणासी ॥ ४८ ॥
तैसे गुण वर्णितां । न पुरे शब्दव्युत्पन्नता ।
वाक्इंद्रिय श्रमता । नेत्रेंद्रिय पाझरे ॥ ४९ ॥
गुरूचें घेतां नाम । अंतरीं पावे विश्राम ।
म्हणे धन्य कुळ धन्य जन्म । ऐसें पद पावलों ॥ ५० ॥
देहाचें करोनि पोतेरें । सारवी स्वामीचीं मंदिरें ।
इंद्रियें उपकरणीं सुंदरे । पीक धरी हस्तकीं ॥ ५१ ॥
गुरुवांचोनि नसे काज । न धरी लोकलाज ।
अधिक सेवा मागें व्याज । सद्‍गुरुपासी ॥ ५२ ॥
गुरु जेथोनि चालले । तया धुळीसही वंदिलें ।
धन्य इचें भाग्य उदेले । चरण वाहिले मस्तकी ॥ ५३ ॥
सकलां गुरुरूप पाहे । आणि नम्र होत आहे ।
जैसा धनलोभी चिंतित राहे । धनागार ॥ ५४ ॥
गुरुसेवीसी तत्पर । आळस ओळखी सांडिली दूर ।
क्षुत्पिपासेचा विसर । चरणीं देह अर्पिला ॥ ५५ ॥
जैसा रवि अहोरात्र । निरालस्य चालवी सूत्र ।
न लागे अन्नवस्त्र । अथवा स्तुतीही वांछिना ॥ ५६ ॥
तैसा सतत सेवा करी । न म्हणे उणी पुरी ।
तनु झिजवी चंदनापरी । अहंता नसे अंतरी ॥ ५७ ॥
सेवेची तन्मयता ऐसी । जें जें लागेल गुरूसी ।
आधींच समजे सच्छिष्यासी । तैसी सामग्री करितसे ॥ ५८ ॥
गुरूसी तृषा लागेल पुढें । पूर्वींच जाणे शिष्य रोकडें ।
पात्र भरोनि करी पुढें । ऐसीं एकाग्रलक्षणें ॥ ५९ ॥
गुरुहूनि निजसखा । दुजा न देखे जो कां ।
गुरुभक्त एकमेकां । भेटतां द्वैत न वाटे ॥ ६० ॥
माय एक गुरुमाय । पिता गुरुचि होय ।
गणगोत गुरुराय । सोय जाणते हिताची ॥ ६१ ॥
चित्त चिंतनीं झिजे । देहासक्ति सेवें बुझे ।
वंदनें अहंकार लाजे । गुरुपुत्रासन्निध जावया ॥ ६२ ॥
अर्चने घडे विषयत्याग । आज्ञा प्रमाण लय अभंग ।
ऐसिया भक्तीनें आत्मयोग । सहजासहजीं घडतसे ॥ ६३ ॥
करितां सप्रेम गुरुभक्ति । सहजीं प्रकाशे ज्योति ।
गुरुभक्त ते जाणती । इतर करिती कुतर्क ॥ ६४ ॥
मातीचा केला द्रोण । निर्विकल्प सेविला गहन ।
न शिकवितां झालें ज्ञान भिल्लासी पहा प्रत्यक्ष ॥ ६५ ॥
सेवा चालली अढळ । संतोषले दीनदयाळ ।
कृपामृताचा खळाळ । लोटला पूर ॥ ६६ ॥
शिष्य वैराग्यें उदास । आणि गुरुवचनीं विश्वास ।
अनन्य शरण आलियास । सद्‍गुरुकृपा वोळतसे ॥ ६७ ॥
गणपति कृपापात्र जाहला । परि पाहिजे परीक्षिला ।
कसवटी पूर्ण उतरला । तरीच श्लाघ्य ॥ ६८ ॥
म्हणोनि एके दिनीं । बैसले सहज सिद्धासनी ।
बोलती शिष्यालागोनि पानें तोडीं वडाचीं ॥ ६९ ॥
गुरुआज्ञा मानोनि शिरीं । शिष्य चढे वृक्षवरी ॥
पर्णें तोडोनिया करीं । भूमीवरी टाकितसे ॥ ७० ॥
ऐसा चालिला क्रम । चीक वाहे तळीं परम ।
तंव बोलती तुकाराम । वृक्षा दुःख देऊं नको ॥ ७१ ॥
अरे हें रुधिर स्रवतें । तरी पर्णें लावीं जेथींची तेथें ।
ऐकोनियां वचनातें । पर्णें सर्व जमविली ॥ ७२ ॥
जेथून तोडिलें पान । तेथें लावी नेवोन ।
तत्काळ जाय मिळोन । पूर्वीं होतें गैसेंचि ॥ ७३ ॥
न धरीं मनीं विकल्प । न करी ‘हो ना’ जल्प ।
वचन प्रमाण हा संकल्प । बाणोनि गेला ॥ ७४ ॥
वृक्ष पूर्ववत् झाला । सद्‍गुरु मनीं संतोषला ।
म्हणे शिष्य भला भला । चैतन्याचा अधिकारी ॥ ७५ ॥
असिई कठिण आज्ञा करिती । कैं दुरुत्तरेंही बोलती ।
कैं धन्य धन्य म्हणोनि गाती । विषाद अहंकार उठेना ॥ ७६ ॥
एकदां मोळी उंसाची । दोघां दोचौघां न हालेचि ।
मस्तकीं देवोनि त्वरेंचि । चलविती निजपंथें ॥ ७७ ॥
धांवती योजन योजन पयंत । मागुतीं शिष्य धांवत ।
मग ऊम्स समस्त । फेंकून देती चहूं दिशां ॥ ७८ ॥
परि निष्कारण देती त्रास । ऐसा न ये किंतु जयास ।
सेवा घेती हेंचि विशेष । म्हणोनि हर्ष मानी ॥ ७९ ॥
गुरुसेवा सतत घडो । चित्त सेवेमाजीं जडो ।
आळस गिरिकंदरी दडो । ऐसें भावी ॥ ८० ॥
कैं अंधारीं फिरविती । सर्पविंचूसी धरविती ।
अंतःस्थिति पाहती । नाना प्रकारें ॥ ८१ ॥
ऐसाचि एक प्रसंग पुढें वर्णूं यथासांग ।
श्रवण करितां अव्यंग । गुरुसेवा कळॊं ये ॥ ८२ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते पंचमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय पाचवा
समास दुसरा

एकदां ओहोळ तटाकांत । बैसले तुकाराम संत ।
सन्निध उभा राजीवसुत । करद्वय जोडोनिया ॥ १ ॥
तंव तेथें लहान बालकें । क्रीडा करिती कौतुकें ।
तुकाराम वदती इतुकें । खड्डा एक काढीं बा ॥ २ ॥
परिसोनियां वचनाप्रति । खड्डा काढिती शीघ्रगती ।
तुकाईनें बालकें हातीं । धरूनि आणिलीं त्या ठायीं ॥ ३ ॥
तीन्ही पोरें खड्ड्यांत । घालोनि वरि वाळून दडपित ।
लीलानाटकी हे संत । काय करिती न कळेचि ॥ ४ ॥
जयांची कर्तुमकर्तुम् शक्ति । ते अन्यथाही करूं शकती ।
शिष्या वरी बैसविती । सिद्धासन घालोनि ॥ ५ ॥
म्हणती कोणासवें न बोलावें । आणि आसनही न त्यगावें ।
ऐसें सांगोन सहजभावें । दूर जावोन बैसले ॥ ६ ॥
सजीव बालकें गोमटीं । पुरविली धरणीचे पोटीं ।
तरी विकल्पकुतर्कगोष्टी । नाठवे सच्छिष्यासी ॥ ७ ॥
सद्‍गुरु त्रिभुवननायक । दयासागर भरले एक ।
मनीं ठसलें ज्या निःशंक । तया विकल्प नाठवे ॥ ८ ॥
देह चरणीं अर्पिला । तेचि वेळीं अभिमान सांडिला ।
सुखदुःख नाठवे चित्ताला । देहजनित विकार ॥ ९ ॥
असो तेथें त्या वेळीं घरची मंडळी शोधूं आलीं ।
म्हणती पोरें कोठें गेली । खेळत होतीं आतांचि ॥ १० ॥
शोधशोधूनि थकले । गणपतीसी पुसूं लागले ।
कोठें चुकलीं आमुची मुलें । तुम्ही देखिलीं कीं नाहीं ॥ ११ ॥
तो न बोलेचि कांही । गुरुआज्ञा मानूनि हृदयीं ।
तंव पाहिली तुकाई । धांवून चरण वंदिले ॥ १२ ॥
मग तुकाईस विनवीत । बालकें चुकलीं निभ्रांत ।
तेणें उद्विग्न झालें चित्त । कांही समाचार सांगावा ॥ १३ ॥
ते वदती तेथें बैसला बुवा । त्यासी समाचार पुसावा ।
न बोले तरी झोडावा । निष्ठूरपणें ॥ १४ ॥
मज वाटतें खचित । यानें केला बाळघात ।
याची करणी अघटित । कोणासही न कळे ॥ १५ ॥
ऐकतांचि ऐसे वचन । धांवले ते क्रोधायमान ।
दांभिका धरिलेंसि मौन । बाळघातक्या निष्ठुरा ॥ १६ ॥
तरी तो कांहीच न बोले । तेणें ते अधिक संतापले ।
लथा बुक्या दंड मारिले । कितीयेक ॥ १७ ॥
मारोनियां थकले बहुत । परि प्रत्युत्तर न मिळत ।
बोलती तुकाराम संत । यासी दूर ढकलावे ॥ १८ ॥
करणी करोति निशाचरी । पोरें पुरोनि बैसला वरी ।
वाळू काढावी सत्वरी । म्हणजे प्रत्यक्ष कळेल ॥ १९ ॥
वाळू काढिली सत्वरेंसी । पाहते जाहले बाळकांसी ।
शोक करिती अतिशयेंसी । पुन्हा मारूं धांवले ॥ २० ॥
मारिती झोडिती पाडिती । नाना दुरुत्तरें बोलती ।
सद्‍गुरु दुरोनि पाहती । अंतरीं आनंद उमाळे ॥ २१ ॥
धन्य शिष्यशिरोमणि । सत्त्वाची ही केवळ खाणी ।
देहभाव सांडोनि । चैतन्यरूपीं निमाला ॥ २२ ॥समस्त जनां निवारिलें । तुमचें बालकां काय झालें ।
अमृतदृष्टीनें पाहिलें । तंव उठोन बैसलीं ॥ २३ ॥
शय्येवरोनि निजोन उठती । तैसीं उठली शीघ्रगती ।
पाहोनि विस्मय चित्तीं । न समाये जनांच्या ॥ २४ ॥
तंव तुकाराम सद्‍गुरुमाऊली । शिष्यासमीप धांवली ।
कवटाळी हृदयकमळीं । मस्तकीं ठेवी वरदहस्त ॥ २५ ॥
सद्‍गुरुकृपामृत स्रवलें । ज्ञानाज्ञान विरालें ।
अमृतमय होऊन राहिलें । अंतर्बाह्य ॥ २६ ॥
आधीं इंद्रियें अंतर्मुख झालीं । स्थूललिंगची वृत्ति उडाली ।
त्रिगुणेंसी आटली । भूतांसहित ॥ २७
॥ महाकारण तुर्या अवस्था । शब्दब्रह्मीं रिघालीं तत्वतां ।
अहंब्रह्माची स्फुरणता । सोऽहंसह मावळली ॥ २८ ॥
उरला आदिचिदानंद । मावळलें मायाभासद्वंद्व ।
जें नोहेचि प्रतिपाद्य्य । वेश्रुतींसी ॥ २९ ॥
चौदेहातीत झाला । मरणा मारोनि उरला ।
आदिमध्यान्त संचला । एक आत्मा ॥ ३० ॥
महामाया गुणमाया । मूळमाया जाय विलया ।
असोनि नुरली काया । ब्रह्मचैतन्यता बाणली ॥ ३१ ॥
अलंकार अनेक भासले । सुवर्णत्वें एकचि झाले ।
तैसें जग अनंत नटलें । मिमलज्ञानें ब्रह्म एक ॥ ३२ ॥
लेखना वाचना अवकाश । तेथें नलगे निमिष ।
द्वैतभावना निःशेष । उडोनि होय तादात्म्य ॥ ३३ ॥
ऐशिया आनंदसागरांत । सद्‍गुरु सच्छिष्य नांदत ।
तेथील एक बिंदु प्राप्त । अनंत सुकृतें होईल ॥ ३४ ॥
गुरुशिष्याची भावना । समूळ उडाली कामना ।
स्वस्वरूपीं लीन जाणा । एकरूप जाहले ॥ ३५ ॥
जैसें काष्ठ अग्नीप्रति । भेटतां होतसे अग्निमूर्ति ।
तैसा शिष्य गुरुप्रति । भेटतां झाला गुरुरूप ॥ ३६ ॥
सरिता सागरा मिळाली । सागररूपें पैसावली ।
अथवा लवण उदक भेट जाहली । संचले एकरूप ॥ ३७ ॥
तैसें द्वैताद्वैतातीत ब्रह्म । चैतन्य प्रकाशलें परम ।
यास्तव ब्रह्मचैतन्य हें नाम । तिकाईनें संबोधिलें ॥ ३८ ॥
ऐसी झाली स्थिति । शब्दीं न वर्णवे निगुती ।
निःशब्दीं शब्दव्युत्पत्ति । चालेल कैसी ॥ ३९ ॥
स्तवनाची आर्त उपजली मोठी । परि मंद बुद्धि मराठी ।
न सुचे तेव्हां दिठी । सद्‍गुरुपदीं ठेविली ॥ ४० ॥
ब्रह्मचैतन्य गुरुमाय । जी दीन अनाथांची सोय ।
जैसी वत्सालागीं गाय । तैसी आम्हां पान्हवली ॥ ४१ ॥
उभयतां आनंदें भेटती । जन समस्त पाहती ।
म्हणती साधूची कृति । ब्रह्मादिकां नेणवे ॥ ४२ ॥
व्यर्थ साधूसी छळिले । धाय मोकलोन र्तडूं लागले ।
तुकाईनें समाधान केलें । सकळैकांचे ॥ ४३ ॥
तुकाराम ब्रह्मचैतन्य । उभयतां झाले अनन्य ।
संवाद झाला गहन । स्थिरचित्तें परिसावा ॥ ४४ ॥
॥ इति श्रीसद्गुलीलामृते पंचमाध्यांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय पाचवा
समास तिसरा

श्रीगुरु वदती शिष्यासी । धन्य धन्य तेजोराशी ।
सांग सेवा झाली तुजसी । आज्ञापितों तें ऐकावें ॥ १ ॥
कलि जाहला उन्मत्त । अधर्म माजला समस्त ।
न सुचे निताहित । जीवमात्रांसी ॥ २ ॥
खर्याच।एन खोटें भास्ते । खोटें सत्यत्वें उठतें ।
कल्पनातरंग नाना मतें । भूमंडळीं पैसावली ॥ ३ ॥
कर्माधिकारी ब्राह्मण । कर्महीन झाले दीन ।
विपरीत संगती गहन । बुद्धि विपरीत जाहली ॥ ४ ॥
आचारभ्रष्ट स्थानभ्रष्ट । अधिकारभ्रष्ट बुद्धिभ्रष्ट ।
देहसुखाची हांव नश्ट । लागली मागें ॥ ५ ॥
जितुकी देहाची हांव धरिली । तितुकी क्षीणता आली ।
शतकाची पन्नाशी झाली । वयसीमा ॥ ६ ॥
देहधर्त्यासी ओळखितां । देहाची कायसी चिंता ।
शीर सलामत आतां । पगड्या बहुत जमतील ॥ ७ ॥
एवं देहसुखावांचून कांही । सर्वथा कार्य उरले नाही ।
नाशिवंत सुखें समाधान कांही । चित्ताचें होईना ॥ ८ ॥
जैसी रोहिणीमाव । तैसी धरली हांव ।
घटोत्कच-दुकानींचा भाव । पाहून हर्ष वाटतो ॥ ९ ॥
देहसुखासी भुलले । शाश्वत टाकोनि धांवले ।
नाशिवंतानेंही पोळले । मग धांवाधांव आरंभिली ॥ १० ॥
न पाहती कुलगोत । आचार विचार वेदप्रणीत ।
वेदांसीच मूर्ख म्हणत । जुनें टाकून नवे घ्यावें ॥ ११ ॥
धर्माधर्म नीतिन्याय । उपाय करितां अपाय ।
देह हेंचि मानूनि ध्येय । आत्मज्ञान विस्रले ॥ १२ ॥
तेणें अत्यंत दीन झाले । स्वसत्तेंते मुकले ।
वंदनेअधीन झाले । ध्र्म सांडिला अनेकी ॥ १३ ॥
सुख राहिलें एकीकडे । धुंडाळिती भलतीकडे ।
मृग जैसा वावडे । कस्तुरीकारणें ॥ १४ ॥
सर्व सुखाचे आगर । सोडोनि धांवला दूर दूर ।
तेणे उपाय तें अपाय थोर । होऊं लागला ॥ १५ ॥
आत्मानुसंधानावांचोनि । नैष्कर्म्य बोधी शब्दज्ञानी ।
आचार्य समर्थांची करणी । ध्यानीं न ये ॥ १६ ॥
कालचक्राचें कौतुक । भजन वाटे निरर्थक ।
तेणें व्याकुळ होती लोक । दिवसेंदिवस ॥ १७ ॥
अहो या भजनानें काय होतें । ऐसें पुसती जाणते ।
परी चित्तशुद्धीसी भजनापुअर्तें । साधन नाहीं ॥ १८ ॥
शब्दज्ञानें वेडावलें । अनुभवाविण कुडे झाले ।
प्रवृत्तिज्ञान म्हणतीं भलें । विषयसुख वांछिती ॥ १९ ॥
नरदेहाचा मुख्य धर्म । आत्मोन्नतीचें जाणावें वर्म ।
तदनुरोधें क्रियाकर्म । करीत असावें ॥ २० ॥
ती दृष्टी विसरली । देहबुद्धि दृढ झाली ।
तेणें अधर्मी प्रवर्तली । दृष्टी सर्व ॥ २१ ॥
वेद शास्त्रें पुराणें । उपनिषदें संतवचनें ।
उपहासिती, आणि शहाणे । म्हणती आम्ही ॥ २२ ॥
पुराणांतरींच्या कथा । असत्य काल्पनिक सर्वथा ।
वाटों लागल्या चित्ता । कलिधर्में ॥ २३ ॥
हा फिरला काळ । तेणें संतांचा पडला दुष्काळ ।
नास्तिकां झाला सुकाळ । अवनीवरी ॥ २४ ॥
तयांमाजी जे भाविक । त्यांसी नसे मार्गदर्शक ।
तेणें सत्यास्त्यविवेक । न सुचे अल्पही ॥ २५ ॥
तयां तुवां बोधावे । नास्तिकां सुपंथा लाववें ।
रामनाम वाढवावें । भूमंडळीं ॥ २६ ॥
कामिकांचे पुरवोनि काम । त्यांसी लावावें भजनी प्रेम ।
कालानुरूप साधन सुगम । उरलें नाहीं आणिक ॥ २७ ॥
आतां जगदुद्धाराकारणें । तुवां जनीं कार्य करणें ।
हे गुरुआज्ञा मानणें वाढवीं भक्ति ॥ २८ ॥
आज्ञा वंदिली मस्तकी । मूर्ति ठेविलीं हृदयमंचकीं ।
गुरुशिष्यां झाली एकी । विरला द्वतभाव ॥ २९ ॥
वंदोनि श्रीगुरूचीं पाउलें । ब्रह्मचैतन्य सद्‍गुरु निघाले ।
प्रथम नैमिष्यारण्यीं गेले । एकांतवास कराया ॥ ३० ॥
वेदधर्म हातीं आलें । अज्ञेय कांही न उरलें ।
योगाभ्यासें दंडण केलें । सगुणदेहाचें ॥ ३१ ॥
देह अत्यंत हलका झाला । आणि तेजें ओथंबला ।
वाटे दुजा कपि आला । उड्डाण करी वृक्षाग्री ॥ ३२ ॥
गुरुसेवा झाली नवमास । पुढें गेले कांही दिवस ।
तोंवरी नऊ संवत्सरास । गृहत्यागासी जाहले ॥ ३३ ॥
गीता रावजी वृद्ध झाले । शोधशोधूनि थकले ।
साधुबैरागी जे भेतले । पुसती त्यांसी पुत्रवार्ता ॥ ३४ ॥
चातक करी मेधआशा । तैसी झाली त्यांची दशा ।
करुणा भाकिती जगदीशा । पुत्र भेटवीं आम्हांते ॥ ३५ ॥
स्नेही सोप्बती विसरोनि जाती । परि मायबाप सर्वदा चिंतिती ।
भार्या पतिव्रता स्ती । तीही सदा ध्यातसे ॥ ३६ ॥
ऐसी आतां इकडील स्थिति । तिकडे सद्‍गुरु मनीं ध्याती ।
आतां जावें गृहाप्रति । मायदर्शनाकारणें ॥ ३७ ॥
गुरुप्राप्तीकारणें जन्मदात्या दुःख देणें ।
घडलें या मायागुणें । निरुपाय तेथे ॥ ३८ ॥
गृही जाण्याचा धरला हेत । श्रीगुरु वैरागीवेष घेत ।
जटा वळल्या समस्त । अंगी विभूती चर्चिली ॥ ३९ ॥
कटीं बांधिला कसोटा । हातें घेती चिलीम चिमटा ।
बैरागी शोभला गोमटा । तेजःपुंज ॥ ४० ॥
तीर्थें क्षेत्रें करीत । स्वामी निघाले गृहाप्रत ।
मार्गीं घेतले सांगात । वैरागी चार ॥ ४१ ॥
पाहतां गुरूंचे मुखाकडे । तत्काळ लीनता जोडे ।
दिस्ती हे साधु गाढे । पोटभरू नव्हेती ॥ ४२ ॥
मार्गीं अनंत शरण येती । शिचा सामग्री अर्पिती ।
मुक्काम करीत गुरुमूर्ति । गोंदावलेस पावली ॥ ४३ ॥
कोणा न देती ओळख । दुरून पाहती कौतुक ।
टकमका पाहती लोक । वैराग्यासी ॥ ४४ ॥
मारुतीचे मंदिरांत । ठाण मांडिती गुरुनाथ ।
समीप अगटी धगधगीत । केली असे ॥ ४५ ॥
दुरोनि देखती मायचरण । आणि पाहती पितृवदन ।
मनींच करोनि वंदन ।देवालयीं बैसले ॥ ४६ ॥दर्शन घेतां प्रेम उठे । परि ओळख कोणा न पटे ।
सद्‍गुरु जाणती गोमटे । समस्तांसी ॥ ४७ ॥
असो जेव्हां झाली निशा । ग्रामीं होता तमाशा ।
जो प्रत्यक्ष यमफांसा । पडला सर्वांवरी ॥ ४८ ॥
जमले सकळ गांववेडे । खदखदा वासती दंताडें ।
श्वान जैसा चघळी हाडें । गोडी ना रस ॥ ४९ ॥
दाजी पाटील गांवकर । आणि अण्णा वारसवडेकर ।
उभयतां देखोनि गुरुवर । म्हणती कोठील बैरागी ॥ ५० ॥
हिरवा तमाखू मुळेल । म्हणोनि गेले ते जवळ ।
गोष्टी करिती प्रांजळ । कोण कोठील म्हणोनि ॥ ५१ ॥
बोलतां उभयतां संबंध आला । गणूबुवा खचित गमला ।
खूण पाहती कान जो तुटला । बाळपणीं ॥ ५२ ॥
परि ओळख न देती । मनीं हर्ष मानिती ।
रजनी सरलिया प्रभातीं । म्हणती समस्तां । कळवूं हे ॥ ५३ ॥
त्यांई ऐसा बेत केला । श्रींनी अंतर्ज्ञानें जाणला ।
उठोन पहांटसमयाला । गेले निघोनि श्वशुरग्रामीं ॥ ५४ ॥
तेथेंही हनुमान मंदिरांत बुवा जाणोनि तळ देत ।
दर्शना अनेक जन येत । सिद्ध पुरुष जाणोनी ॥ ५५ ॥
पाहूनिया तेज शांति । पूज्यभाव उपजें चित्तीं ।
संसारी अनेक प्रश्न करिती । कायाव्याधी पीडितसे ॥ ५६ ॥
कोणा सांगती रामनाम । कोणा प्रदक्षिणेचा नियम ।
कोणा औषधी सुगम । सांगते झाले तेधवां ॥ ५७ ॥
खातवळीं पसरली मात । मारुतीचे मंदिरांत ।
कोणी आले महंत । त्रिकालज्ञानी ॥ ५८ ॥
श्रीगुरूंचे श्वशुरगृहीं । चिंता करतीं प्रत्यही ।
कधीं येईल जांवई । परतोनि गृहातें ॥ ५९ ॥
सासूसी कानगी कळली । कन्येसह दर्शना गेली ।
गर्दी जाईतों उभी ठेली । मग करी वंदन ॥ ६० ॥
स्वामीं एक विनवणी ।कन्येचा गेला घरधनी ।
कोठें गृह त्यागोनि । मागुता केव्हां येईल ॥ ६१ ॥
रात्र।ंदिन वाटे चिंता । कन्या प्रौढ झाली आतां ।
पति केव्हां येईल मागुता । सांगा स्वामी ॥ ६२ ॥
श्रीगुरु बोलती वचन । अखंड केलिया नामस्मरण ।
त्वरित येईल परतोन । चित्तीं चिंता न करावी ॥ ६३ ॥
बोलोनि ऐसीं उत्तरें । किरीक्षिती ते अंतरें ।
आचारनीति शोधिती सारें । ओळख न देती आपुली ॥ ६४ ॥
पाहिली गोंदावलीची स्थिति । तैसीच येथीलही पाहती ।
पुढें गेले डांबेवाडिप्रति। चुलत भगिनीसी भेटाया ॥ ६५ ॥
दारी जाऊनि ‘रघुवीर’ । ऐसा केला उच्च गजर ।
‘भीमाताई भिक्षा सत्वर । आणुनिया घालावी’ ॥ ६६ ॥
ऐसा शब्द पडतां कानीं । भीमा दचकली मनीं ।
गोसावी कोण मजलागोनि । नामें हांका मारित ॥ ६७ ॥
बाहेर येवोनि पाहात । ओळखी कांही न लागत ।
परि आनंदलें चित्त । उगाच पाहे मुखाकडे ॥ ६८ ॥
दिव्य रूप भव्य मूर्ति । मस्तकीं जटा शोभती ।
कौपीनधारी आणि विभूति । सर्वांगासी चर्चिलीसे ॥ ६९ ॥
सद्‍गुरु वदती ‘भीमाताई । सासरी तल्लीन झालीस बाई ।
ओळखी सांडिली सर्वही । माहेरघरची’ ॥ ७० ॥
इतुकें परिसतां सत्वरी । गणू म्हणूनि हांक मारी ।
आनंदे नयनीं नीर धरी । गुण आठवी बाळपणींचे ॥ ७१ ॥
‘कासया झालासि निष्ठूर । सोडून गेलास घरदार ।
दुखविलें सर्वांचे अंतर । काय साधिलें सांग बा; ॥ ७२ ॥
येरु वदे साधिले नाहीं । ऐसी वस्तूच नसे कांही ।
असो, आज्ञा देई लवलाहीं । मज जाणें असे बहु दूर ॥ ७३ ॥
कोणा सांगू नये वार्ता । गणपति येथें आला होता ।
सत्वरे।एन येईल मागुता । सत्य सत्य जाणावें ॥ ७४ ॥
ऐसें बोलोनि सत्वर । निघाला तो योगेश्वर ।
भगिनी हांक मारी करुणास्वर । ‘सत्वर येईं परतोनि’ ॥ ७५ ॥
श्रीगुरु निघाले तेथून । तीर्थें क्षेत्रें करिती भ्रमण ।
सूक्ष्मपणें अवलोकून । जनस्थिति जाणति ॥ ७६ ॥
बहुतेक असती कामासक्त । आश्रमधर्मासि विरक्त ।
धनें विंधिलें चित्त । सर्वत्रांचे सारिखें ॥ ७७ ॥
वेद अतिथि साधुसंत । असत्य मानिती पौराणमत ।
हिंसाकर्मीं प्रवर्तत । वाग्जल्प वाढला ॥ ७८ ॥
राजसत्ता विधर्मी झाली । धर्मश्रद्धा उडाली ।
समाधानापासोनि ढळली । जनता सर्व ॥ ७९ ॥
नाना प्रापंचिक आपत्ती । अपार विघ्नें आदळती ।
बुद्धि आयुष्य शरीरसंपत्ती । विलया जात चालली ॥ ८० ॥
जितुक्या सुखसोई केल्या ।तितुक्या गरजा वाढल्या ।
देह पराधीन झाला । व्यसनीं अत्यंत नागवले ॥ ८१ ॥
जगच्चालक आत्माराम । विसरतां वृथाचि श्रम ।
कोठें न मिळे आराम , त्रिखंदही शोधिल्यां । ८२ ॥
काम्यकर्में कांही राहिली । नैष्कर्म्यभाव्ना उडाली ।
पातकांची सीमा झाली । व्यभिचारकर्म वाढलें ॥ ८३ ॥
सकळांसी भ्रष्टता आली । दैवी शक्ती अदृष्य झाली ।
तेणें श्रद्धा उडोनि गेली । देववेदसंतांवरची ॥ ८४ ॥
नास्तिक बनोनि सकळ । अनुभवहीन वाग्जाळ ।
घरोघरीं ब्रहसुकाळ । वैखरीवरी राहिला ॥ ८५ ॥
अनुभवाविण निर्गुण । श्रद्धेविना सगुण भजन ।
करितां नव्हे समाधान । कोणाएकाचें ॥ ८६ ॥
सगुणीं सायुज्यता घडे । तरीच निर्गुणज्ञान जोडे ।
श्रद्धा सगुणीं पवाडे । नवविधा भक्तिमार्गें ॥ ८७ ॥
कुलशील चित्तशुद्धि । परंपरागत धर्मबुद्धि ।
लया जातां वेदविधि । यथासांग घडेना ॥ ८८ ॥
दुर्धर कलि माजला । अधर्म बहु पैसावला ।
तरुणोपाव न उरला । प्राणियांसी ॥ ८९ ॥
यास्तव सुलभ रामभजनीं । लावावें श्रीगुरुवचनीं ।
ऐसें आणोनि ध्यानीं । विचरती महीवरी ॥ ९० ॥
इथि श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरुविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ९१ ॥
॥ इति श्रीसद्‍गुरुलीलामृते पंचमाध्यायांतर्वतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति पञ्चमोऽ

अध्याय सहावा
समास पहिला

विदेहाप्री चालवोनी प्रपंचा । मुमुक्षुजनांलागिं अध्यात्मचर्चा ॥
करोनी बहू लोक जे मेळविती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ६ ॥

जयजय सद्‌गुरु स्वानंदा । भक्तिकमलमकरंदा ।
मुमुक्षुभृंग घेती स्वादा । नाठवे देहभाव ॥ १ ॥
तुझिये आनंदाची गोडी । चाखिती जे जे वर्हाडी ।
तितुके गेले देशोधडी । अहंता निःशेष सोडोनी ॥ २ ॥
कोणा न देती ओळख । वरिवरी दिसती स्वाभाविक ।
परि परिपूर्ण निजसुख । स्वानंदरस सेविला ॥ ३ ॥
आकंठ अमर्याद भरले । तेणें ते उन्मत्त झाले ।
घरच्या घरीं बावरले । नवल वाटे ॥ ४ ॥
मायेची ममता सांडिली । पितयाची आज्ञा मोडिली ।
आशा मावशी ती वधिली । देखतदेखतां ॥ ५ ॥
कामक्रोध बंधूंवरी । जो कां सदा गुरगुरी ।
कल्पना ईषणा भगिनी सुंदरी । समोर येऊं देईना ॥ ६ ॥
प्रारब्धठेवा लुटविला । घराचा देव्हारा केला ।
मरणा मारोन उरला । आनंदरस चाखित ॥ ७ ॥
शब्दस्पर्शरूपरस- । गंधभूषणे वेशीस ।
बांधोनि राही उदास । सर्वकाळ आनंदी ॥ ८ ॥
जगावेगळा बडबडे । जगीं असोनियां दडे ।
प्रपंच व्यवसाय नावडे । परि करणें सोडीना ॥ ९ ॥
दया क्षमा शांती त्यापासीं । आत्मतत्त्वीं रमे अहर्निशी ।
सांडोनि लोकलज्जेसी । आनंदमदें धुंद झाला ॥ १० ॥
न मानी आपपर । विधिनिषेधादि आचार ।
बुडविलें सकळ घरदार । आनंदोर्मीमाझारीं ॥ ११ ॥
आनंदे उन्मत्त झाला । न मानी कळिकाळाला ।
पुण्यपाप तुडवूं लागला । सकळ उपाधी ॥ १२ ॥
ऐसा तूं आनंदघन । सेवितां तें सेवकपण ।
समूळ जाय विरोन । सेव्यसेवाआनंद ॥ १३ ॥
जया घडेल हा योग । तेणेंचि साधिला लाग ।
इतरें राखिली तगमग । नरदेहा येवोनि ॥ १४ ॥
सबल सुकृतांच्या राशी । सत्संग नम्रता जयासी ।
तोचि जाणे स्वानंदासी । ज्ञानाज्ञान गिळोनी ॥ १५ ॥
अथवा श्रद्धेचा ओलावा । धरोनि करितां गुरुसेवा ।
स्वानंदसोहळा भोगावा । नित्य सत्य निर्विकार ॥ १६ ॥
ऐसी सेवा साधोनि । सद्‌गुरु गेले नैमिषवनीं ।
एकांतवास साधोनि । पुनरपि गृहीं निघाले ॥ १७ ॥
मार्गीं बहुधा बोधिलें । अनुग्रहें सुखी केलें ।
रामभक्तीसी लाविले । अज्ञ विकल्पी भाविक ॥ १८ ॥
अनेक कामना पुरवोनि । जन लाविती रामभजनीं ।
जेवी औषध न सेवी म्हणोनि । बाळा साखरखडा दाखविती ॥ १९ ॥
ऐसा करित जगदुद्धार । पावले गोंदावलें नगर ।
गृहीं जावोनि ‘रघुवीर’ । पुकारीतसे गोसावी ॥ २० ॥
माय येवोनि जंव पाहे । तंव गोसावी उभा आहे ।
अंगीं तेज न समाये । प्रेमजिव्हाळा उफाळे ॥ २१ ॥
मागें गणू येवोनि गेला । तोही गोसावीच झाला ।
वर्तमान ठाउकें असेल याला । म्हणोनि करी प्रश्नातें ॥ २२ ॥
‘अहो साधु महाज्ञानी । तुम्ही फिरतां रानींवनीं ।
कोठे दिसला कीं नयनीं । पुत्र आमुचा सांगावा ॥ २३ ॥
सदा रामनाम घेत । तुम्हांसारिखा वेष धरित ।
सद्‌गुरुकारणें फिरत । देशीं विदेशीं ॥ २४ ॥
सद्गुणी चातुर्याची खाण । वय सान वैराग्य पूर्ण ।
मध्यमसा गौरवर्ण । अंगठेव सुदृढ ॥ २५ ॥
आम्हां दुःखीं टाकोनि । गेला गृह सोडोनि ।
कोठें देखिला कीं नयनीं । कृपा करूनि सांगावे’ ॥ २६ ॥
सद्‌गुरु बोलती मातेप्रति । ‘माउली चिंता नसावी चित्तीं ।
उदयीक भेटेल निश्चितीं । तुमचा सुत तुम्हांसी’ ॥ २७ ॥
ऐसें वदोन सत्वर । पावले हनुमंतमंदिर ।
दुरोनि पाहती चमत्कार । बाळपणाचा ॥ २८ ॥
नानापरी क्रिडा केली । सोबत्यांची मांदी मेळविली ।
आजीं सर्व पारखीं झालीं । जवळी असोनि ॥ २९ ॥
एक रात्र केली वसति । ओळखी कोणा न देती ।
दुजे दिनीं पाचारिती । चिंतूबुवासी ॥ ३० ॥
उपाध्याय चिंतूबुवा । संबोधिती घेऊन नांवा ।
बालपणाच्या गोष्टीं तेव्हां । खुणेलागीं सांगितल्या ॥ ३१ ॥
खूण पटतां हर्ष झाला । धांवला रावजीगृहाला ।
‘गीताई तुमचा सुत आला । मंदिरामाजीं’ ॥ ३२ ॥
शब्द पडतांचि श्रवणीं । गीता निघे झडकरोनि ।
गणपति तैं धांवोनि । चरण धरी जननीचे ॥ ३३ ॥
उभयतां संतोष झाला । गणपति सर्वां भेटला ।
हरपला ठेवा गवसला । गोंदावलीसी ॥ ३४ ॥
बालपणचे मित्र सारे । करिती नाना प्रश्नोत्तरें ।
निवविती सकलांचीं अंतरें । प्रवासकथा सांगोनी ॥ ३५ ॥
कथिती अध्यात्मज्ञान । रामभक्ति सगुणभजन ।
सर्वांचे वेधिती मन । आपणाकडे ॥ ३६ ॥
शरण येती तयांसी । निववूनि रामभक्तीसी ।
लाविती तत्क्षणेंसी । युक्तिप्रयुक्ति ॥ ३७ ॥
प्रापंचिकां युक्तिवाद । मुमुक्षुंसी भक्तिबोध ।
नास्तिकांसी प्रेमसंवाद । करोनि भजनीं लाविती ॥ ३८ ॥
मुखोमुखीं पसरली मात । गोंदावलीसी आले संत ।
साक्षात्कारें समाधान देत । प्राणिमात्रासीं ॥ ३९ ॥
शर्करा पाहूनि मुंग्या धांवती । तैसें झालें गोंदावलीप्रति ।
बहुत ग्रामींचे जन येती । साधुदर्शनाकारणें ॥ ४० ॥ बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध । करिती प्रेमसंवाद ।
समाधान पावोनि धरिती पद । सद्गुरूंचें ते काळीं ॥ ४१ ॥
कोणी म्हणती सिद्धपुरुष । कोणी मानिती देवांश ।
पावले देव प्रत्यक्ष । गोंदावलेंग्रामासी ॥ ४२ ॥
सकलां दर्शनें आनंदवी । ऐसा पावला गोसावी ।
सर्वांगी विभूति लावी । कौपीन परिधान करीतसे ॥ ४३ ॥
जटा दाढी शोभा देती । पायीं खडावा गर्जती ।
गणेशटोपी कफनी घालिती । हातीं स्मरणी शोभतसे ॥ ४४ ॥
मुद्रा रामनामांकित । कुबडी करीं वागवित ।
सदा आनंदें भजन करित । संगें भक्तजन घेवोनि ॥ ४५ ॥
गृहीं वास न करिती । विठ्ठलमंदिरासमीप वसति ।
कट्टा करोनि बैसती । समुदायासमवेत ॥ ४६ ॥
कीर्ति पसरली चहूंदेशी । मत्सर वाटे स्वकीयांसी ।
न साहवे परोत्कर्षासी । हा स्वभावधर्म ॥ ४७ ॥
स्तोम माजविलें फार । सर्व यासी पुसती विचार ।
आमचा अपमान होतो फार । अधिकारी यासी वंदिती ॥ ४८ ॥
तरी आतां ऐसें करावें । यासी मुंडण करवावें ।
गृहस्थाश्रमीं लावावें । म्हणजे महती जाईल ॥ ४९ ॥
करोनि ऐसा विचार । म्हणती हा उतरावा केशभार ।
सद्‌गुरु वदती अनिवार । खर्च असे तयासी ॥ ५० ॥
होम हवन ब्राह्मणभोजन । सांगता असे गहन ।
येरू वदती तयांलागून । सर्व करूं यथासांग ॥ ५१ ॥
त्यांचे मनींचा भाव जाणती । परि गुरुआज्ञा झाली होती ।
प्रपंच करोनि रामभक्ति । वाढवावी सतत ॥ ५२ ॥
स्वार्थ तीर्थ साध्य होतें । म्हणोनि करविलें मुंडणातें ।
अन्नदान हवनातें । यथासांग करविलें ॥ ५३ ॥
रावजी गीता आनंदले । म्हणती बाळ शुद्धीस आले ।
आतां प्रपंच करील वहिलें । चिंता सर्व उडालीं ॥ ५४ ॥
कांता सरस्वती खातवळी । चिंता वाहोन कृश झाली ।
तिजला सत्वर आणिली । कृपासागरें गुरुरायें ॥ ५५ ॥
प्रपंच चालिला अव्यंग । सदा भजती श्रीरंग ।
दर्शना येतसे जग । पूर्वींहूनि अधिकचि ॥ ५६ ॥
प्रपंच करोनि परमार्थ । कैसा साधावा स्वार्थ ।
दाविती राहोनि विरक्त । समस्तांसी ॥ ५७ ॥
प्रातःकालीं देवतार्चन । अखंड करिती नामस्मरण ।
अध्यात्मचर्चा विवरण । श्रोतृसमुदाय निवविती ॥ ५८ ॥
नाना शंका उपशंका । प्रत्ययें फेडिती देखा ।
ग्रंथार्थ बोधिती लोकां । विशद करोनि ॥ ५९ ॥
दासबोध नाथभागवत । भगवद्गीता अध्यात्मग्रंथ ।
अभंगादि गाथा समस्त । तुलसीकृत रामायण ॥ ६० ॥
ग्रंथाग्रंथांची एकवाक्यता । विवरोनि दाविती समस्तां ।
श्रवण करितां श्रोता वक्ता । तादात्म्यता पावती ॥ ६१ ॥
चालतां अध्यात्मनिरूपण । उपासना बोधिती सगुण ।
भक्ति प्रेम उचंबळोन । येतसे श्रोतयांसी ॥ ६२ ॥
ब्रह्मज्ञानाच्या गोष्टीं सांगती । आणि सगुणातें न भजती ।
तेणें इहपर नाडती । ऐसे वक्ते बहुतेक ॥ ६३ ॥
शब्दज्ञानें भरीं भरिती । आणि उपासना सोडिती ।
तैसी नव्हे गुरुमूर्ति । बोधिती सगुणभजन ॥ ६४ ॥
स्वयें आचरोनि दाविलें । आणि जनां शिकविलें ।
तेणें समाधान पावले । कितीएक ॥ ६५ ॥
सायंकाळीं प्रेमळ भजन । करुणारस रूपध्यान ।
नानापरीनें स्तवन । रामरायाचें होतसे ॥ ६६ ॥
बहुत संतांची वचनें । अभंगपदादि कवनें ।
जेणें साधका उपदेश बाणे । भजन अति रसाळ ॥ ६७ ॥
अष्टकें श्लोक आरती । ऐसें भजन नित्य करिती ।
स्वयें करोनि करविती । जनांकरवीं ॥ ६८ ॥
चालविती ऐसी उपासना । प्रपंचकार्यें करिती नाना ।
गोसावी झाला शहाणा । म्हणती सर्व ॥ ६९ ॥
माय बोले गणपतीप्रति । ‘एक इच्छा असे निगुती ।
वडिलार्जित वतनवृत्ती । अंगीकारावी तुवां ॥ ७० ॥
पाळी असे आपुली आली । ती पाहिजे तुवां केली ।
मान्य करीं आमुची बोली । पुत्रधर्म म्हणोनि’ ॥ ७१ ॥
श्रीगुरु वदती ‘माय । रामसेवे अर्पिला देह ।
गरज नसे नोकरी गेह । आम्हां गोसावियासी ॥ ७२ ॥
परि मातृआज्ञा म्हणोनि । होईन मी कुलकर्णी ।
कांही काल क्रमोनि । पुनरपि जाईन वनातें’ ॥ ७३ ॥
पुरविण्या वडिलांची हौस । हातीं घेतले वतनास ।
नीतिन्यायमर्यादेस । सीमा नाही ॥ ७४ ॥
भूतीं भाविती भगवंत । न करिती अन्याय घात ।
पंचतत्त्वविवरण जेथ । हिशोबाची काय कथा ॥ ७५ ॥
कळिकाळा ज्याची सत्ता । तया गांवची कायसी वार्ता ।
आश्चर्य वाटे समस्तां । कोठें शिकला ज्ञान हें ॥ ७६ ॥
रयत म्हणती भलें झालें । सुज्ञ कुलकर्णी लाभले ।
अधिकारी संतोषले । कामकाज देखुनी ॥ ७७ ॥
मायबापां संतोष झाला । तीन मास काळ गेला ।
सद्गुरूंनी बदली दिला । पुरे म्हणती व्याप हा ॥ ७८ ॥
रामसेवा करावी । व्यक्ति भक्तीसी लावावी ।
याहोन अन्य पदवी । नको आम्हां ॥ ७९ ॥
जाणें असे नैमिषारण्यीं । मग सद्‌गुरुभेटीलागोनि ।
तुम्ही रामनाम वदनीं । घेत असावें सर्वकाळ ॥ ८० ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सहावा
समास दुसरा

ब्रह्मचैतन्य गुरुवर । म्हणती करूं देशांतर ।
भार्या सद्गुणी चतुर । समागमे येऊं म्हणे ॥ १ ॥
अखंड करी नामस्मरण । पतिवचनीं विश्वास पूर्ण ।
सदा ध्याई पतिचरण । पतिव्रता गुरुभार्या ॥ २ ॥
धन्य पतिव्रता माउली । जी ऐसे पद पावली ।
बरी सत्त्वगुणें शोभली । चंद्रकांति जैशी ॥ ३ ॥
सद्‌गुरु तेज दिनकर । सरस्वती प्रभा सुंदर ।
दर्शनें श्रमपरिहार । संसारिकांचा होतसे ॥ ४ ॥
पाळिले मायबापबोला । प्रपंच सर्व नेटका केला ।
मग त्वरित निघाले देशाला । जगदुद्धार करावया ॥ ५ ॥
शकें सत्राशें शहाण्णवीं । बाहेर निघाले गोसावी ।
सवें भार्या शुद्धभावी । गुरुदर्शना घेतली ॥ ६ ॥
दोन प्रहर रजनीसी । निघाले भार्येसरसीं ।
शरण रिघाले तुकाईसी । उभयतां चरणीं लोळती ॥ ७ ॥
पाहोनि शुद्धभाव परम । संतोषला तुकाराम ।
जोडी शोभे सीताराम । दुजीं मर्त्यलोकीं ॥ ८ ॥
तुकाराम वदती ’सती । काय इच्छा तुजप्रति ।
माग माग शीघ्रगति । पूर्ण होय निश्चयें’ ॥ ९ ॥
सती वदे ’पुत्ररत्न । व्हावें पतिसमान ।
हेंचि द्यावें वरदान । महाराजा समर्था ॥ १० ॥
देहवृक्ष सफलित । होतां होईन पुनीत ।
वांझपणें वृथा जात । लोकनिंदाकारण’ ॥ ११ ॥
ऐकोनि ऐसें वचन । गुरुशिष्य करिती हास्यवदन ।
मायेनें मोहिलें म्हणोन । पुत्ररत्न इच्छिलें ॥ १२ ॥
तुकाराम ’तथास्तु’ म्हणती । उभयतांसी निरोप देती ।
मग पावले नाशिकप्रांतीं । पंचवटीसमीप ॥ १३ ॥
सद्‌गुरु वदती भार्येसी । ’काय आठवली विवसी ।
मागितलें पुत्रवरासी । मोक्षदात्यासन्निध ॥ १४ ॥
कामधेनू गृहीं आली । क्षीर सेवून सोडिली ।
ऐसी तुवां करणी केली । मायामोहित होवोनि ॥ १५ ॥
अवचटें परिस गवसला । तो भिंतीमाजीं चिणिला ।
तेणें सुवर्णलाभा मुकला । अभागी जैसा ॥ १६ ॥
अथवा कल्पतरूतळी बैसोनी । अभागी कल्पना करी मनीं ।
भूत झडपील मजलागोनि । या निर्जन अरण्यांत ॥ १७ ॥
राजा बहु संतुष्ट झाला । म्हणें इच्छिलें देईन तुजला ।
अभागी वदे देईं मजला । जीर्ण वस्त्र एखादें ॥ १८ ॥
अत्तरें माखलीं पादत्राणीं । हिरा बैसविला अंगणीं ।
घरीं धान्य नसे गोणी । ऐसें आजि तुवां केलें ॥ १९ ॥
कण फेंकून भूस भरिलें । अथवा चंदन काष्ठें पाणी तापविलें ।
तैसें आजि तुवां केले । पुत्रस्नेहा भुलोनि ॥ २० ॥
जो मोक्षश्रियेचा दाता । जन्ममरणातें चुकविता ।
चिदानंदासी भोगविता । कृपासागर सद्‌गुरु ॥ २१ ॥
तो झालिया प्रसन्न । इच्छिसी पुत्रसंतान ।
न वांछिसि भक्ति अनन्य । रामसेवा घडावी ॥ २२ ॥
चौर्यांशी लक्ष योनी फिरतां । किती पुत्रांची झालीस माता ।
जन्ममरणीं सोडविता । एकही कोठें दिसेना ॥ २३ ॥
नरदेह दो दिवसांची वसति । कोण कोणाचा संगाती ।
कन्या पुत्र आणि पति । देहसंबंधी सकळही ॥ २४ ॥
तो देह नाशिवंत । तत्संबंधीही अशाश्वत ।
ज्याचें त्यानें करावें हित । सद्‌गुरुकृपें ॥ २५ ॥
पुन्नाम नरकापासोनि । म्हणती पुत्र तारील झणीं ।
परि नरकीं जावेंचि कोणी । वासनाक्षय झालिया ॥ २६ ॥
वासना निमालिया पाठीं । स्वर्गनरकाची आटाआटी ।
पापपुण्य उठाउठी । लया जाय मिथ्यत्वें ॥ २७ ॥
उद्धरील बेचाळीस कुळांते । ऐसें बोलती जाणते ।
उद्धरणें तें स्वर्गापरतें । आन नाही ॥ २८ ॥
स्वर्ग क्षीणतेतें पावे । त्यासि हित कैसे म्हणावे ।
तोडिले संसृतीचे गोवे । तरीच हित सधिलें । २९ ॥
जन्मा आलियाचें सार्थक । कांही करावा विवेक ।
जेणें फिटेल हें दुःख । संसृतिजन्य ॥ ३० ॥
असो गुरुकृपें होईल सुत । परि अल्पायुषी अशाश्वत ।
तेणें तुज काय प्राप्त । होईल सांग निश्चयें ॥ ३१ ॥
प्रकृतीपासोन सुख । इच्छिती ते परम मूर्ख ।
दुःखमूळ हा निःशंक । मायाजनित पसारा’ ॥ ३२ ॥माय सरस्वती खोंचली । म्हणे मज भुली पडली ।
आतां जेणें सार्थकता भली । ती सोय सांगावी ॥ ३३ ॥
सुख एक रामचरणीं । सुखदाता तोचि धनी ।
इतर ते निर्वाणीं । दूर होती पारिखे ॥ ३४ ॥
तुम्ही साधु महाज्ञानी । मज ठाव द्यावा चरणीं ।
लीन दीन उत्सुक म्हणोनि । उपेक्षा करूं नये ॥ ३५ ॥
जेणें मायामोह सुटेल । अनन्यभक्ति पाविजेल ।
मन रामीं रत होईल । ऐसें करावें ॥ ३६ ॥
आपण या देहाचे धनी । देह सार्थकीं लावावा झणीं ।
वरी करितें विनवणी । कृपाळुवा दीनानाथा ॥ ३७ ॥
परिसोनि कांतेचे वचन । संतोषले दयाघन ।
योगदीक्षा तिजलागोन । दिधली तेव्हां गुरुरायें ॥ ३८ ॥
वटदुग्धें जटा वळिल्या । कांचनबांगड्या काढिल्या ।
तुळसीमाळा करीं बांधिल्या । कंठी सूत्र तुळशीचें ॥ ३९ ॥
श्वेत वस्त्र परिधान । भू शय्या व्योम प्रावरण ।
अखंड करविती नामस्मरण । योगमुद्रा सांगितल्या ॥ ४० ॥
प्राणायाम करविती । समाधिही लाविती ।
उपदेशवचनें बोधिती । नित्यकाळीं ॥ ४१ ॥
नदीतटाक गुहावास । वाटे रामाचा वनवास ।
सीमा नसे आनंदास । तया स्थानीं ॥ ४२ ॥
वाटे ऋषीचा आश्रम । उपासना चालिली दुर्गम ।
नित्य ध्याती आत्माराम । सद्‌गुरु आणि माउली ॥ ४३ ॥
कमलसुमन शोधीत भुंगे । धांवती जैसे मनोवेगें ।
मुमुक्षुजन तैसा रिघे । बोधामृत सेवाया ॥ ४४ ॥
अयाचित भिक्षा घेती । कित्येक उपोषणें घडती ।
तेंही समाधान मानिती । नामामृत सेवूनि ॥ ४५ ॥
ऐसा काळ गेला कांही । माउली झाली विदेही ।
न गुंते मायामोहीं । ऐसें जाणिलें गुरुदेवें ॥ ४६ ॥
रामनामी तल्लीन झाली । निःसंदेह वृत्ति बनली ।
सद्‌गुरु निघाले ते काळी । सोडूनिया कांतेसी ॥ ४७ ॥
नाना तीर्थें नाना देश । वनोपवन भाषाविशेष ।
उत्तर दक्षिण भागास । फिरत फिरत चालिले ॥ ४८ ॥
इकडे सरस्वतीमाउली । म्हणें स्वारी कोठें गेली ।
गृही जाण्याची आज्ञा झाली । असे पूर्वीं मजलागी ॥ ४९ ॥
नाशिकग्रामीं गुरुभक्त । कृष्णभट त्रिंबकसुत ।
तेथें जावोनि वदत । ’मज गृहीं पोंचवावें’ ॥ ५० ॥
गुरुपत्नी गृहा आली । तिसी देखतांचे नमस्कार घाली ।
वदे ’आमुची झोंपडी पावन केली । हें महद्भाग्य ॥ ५१ ॥
दोन दिवस हेंचि माहेर । करावा दीक्षेचा उपसंहार ।
मग जाऊं सत्वर । आपले ग्रामीं’ ॥ ५२ ॥
न्हाऊं माखूं घातले । चोळी कंकण लुगडे दिलें ।
सुग्रास जेवूं घातलें । अत्यानंद मानिला ॥ ५३ ॥
दोन दिवस ठेवोनि । निघाले संगे घेवोनि ।
नातेंपुतेंमाजी भगिनी । होती तेथें पोंचविलें ॥ ५४ ॥
इकडे सकल चिंता करित । होते तयां कळली मात ।
ते आनंदें भेटों येत । विचार पुसती मार्गींचा ॥ ५५ ॥
कैसें साधन कैसें भजन । कैसें करविले अनुष्ठान ।
योगदीक्षा किती गहन । सांगतसे सकळांते ॥ ५६ ॥
भेटले तुकाराम सद्‌गुरु । मागितला म्यां पुत्रवरु ।
तेणें कैसा झाला विचारु । आल्हादकारी ॥ ५७ ॥
कैसें घडे अन्नग्रहण । कैं होई उपोषण ।
परि न डळमळे समाधान । सदा आनंदीआनंद ॥ ५८ ॥
माय कुरवाळोन बोले । कष्टलीस नाजुक बाळे ।
दैवीं असे जे लिहिलें । उपाय नसे तयासी ॥ ५९ ॥
कन्या वदे गे आई । कष्टावांचोनि सुख नाही ।
तुम्हीं ऐसा जोडिला जांवई । धन्य भाग्य तुमचें ॥ ६० ॥
तेणें मज समाधान दिलें । पूर्वसुकृत फळा आले ।
धन्य वंदावीं पाउलें । थोरथोरां दुर्लभ’ ॥ ६१ ॥
ऐसे बहुत बोलोन । करी सकळांचें समाधान ।
सदा ध्यायी पतिचरण । रामनाम घेतसे ॥ ६२ ॥
गीता-रावजींस कळली मात । सून सांगे वृत्तांत ।
त्वरित येतील निश्चित । चिंता कांही न करावी ॥ ६३ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सहावा
समास तिसरा

इकडे सद्‌गुरुनिधान । पुनरपि घेती गुरुदर्शन ।
मग करिती तीर्थाटन । नाना देशी ॥ १ ॥
अयोध्या मथुरा हरिद्वार । हिमाचलीं बदरीकेदार ।
जाती काशी विश्वेश्वर । क्षेत्रें पुनीत करावया ॥ २ ॥
उत्तरतीर्थें सर्व करोनि । कांही वास इंदोर भुवनीं ।
शरणागतांसी तारोनी । संप्रदाय वाढविती ॥ ३ ॥
इंदोर येथें शिष्य फार । सद्गुरूंचे झाले किंकर ।
त्यांतील जे सत्त्वागार । नामें सांगूं तयांची ॥ ४ ॥
भैय्यासाहेब मोडक म्हणोनि । अखंड होते नामस्मरणी ।
सद्‌गुरु राहती त्यांचे सदनीं । शुद्धभाव पाहोनियां ॥ ५ ॥
जिजीबाई नामेंकरोनि । विप्रस्त्री सुज्ञ सद्गुणी ।
लगाली श्रीसमर्थ चरणी । देह सार्थक करावया ॥ ६ ॥
जिजीबाईस तुकारामदर्शन । तैसें भैयांसही जाण ।
करविलें स्वयें नेऊन । परमभाविक जाणूनिया ॥ ७ ॥
रावसाहेब पळशीकर । दिवाण सद्गुणी चतुर ।
आणिकही असती शिष्य फार । इंदोरग्रामी ॥ ८ ॥
इंदोर हर्दा गोंदावली । सद्गुरूंची स्थाने भली ।
बहुत दिवस वस्ती केली । परमक्षेत्रें पुण्यभूमी ॥ ९ ॥
इंदुरी विशेष प्रसिद्ध । आनंदसागर ब्रह्मानंद ।
गुरुकृपें झाले सिद्ध । सर्वाधिकारी ॥ १० ॥
तयां उपदेश त्या ग्रामी । म्हणोनि विशेष पुण्यभूमी ।
वरचेवरी सद्‌गुरुस्वामी । वास करिती त्या ठायीं ॥ ११ ॥
कांही काळ करोनि वास । सद्‌गुरु निघाले दक्षिणेस ।
मार्गीं देती बहुतांस । उपदेश परमपावन ॥ १२ ॥
बहुत लोक दर्शना येती । बहुतांच्या कामना पुरविती ।
नाना चमत्कार घडती । आश्चर्य वाटे सकळांसी ॥ १३ ॥
कोणी दोघे कालिकाउपासक । होते परममांत्रिक ।
जारणमारण-उच्चाटणादिक । विद्येमाजीं अति कुशल ॥ १४ ॥
त्यांनी श्रीगुरु देखिले । नाना चमत्कार करिती भले ।
म्हणती आपणांहून आगळें । सामर्थ्य दिसतें यांजपाशी ॥ १५ ॥
तरी एवढी विद्या शिकावी । म्हणजे वाढेल पदवी ।
काय युक्ति योजावी । विद्याधन मिळवावया ॥ १६ ॥
आसुरें विद्येमाजी प्रवीण । लेखिती आपणांसारिखे जन ।
बहुत प्रकारें विनवोन । म्हणती मंत्र संगावा ॥ १७ ॥
सद्‌गुरु वदती तयांसी । भक्ताभिमानी वैकुंठवासी ।
तोचि घडविता कार्यासी । आम्ही असों निमित्तमात्र ॥ १८ ॥
नाहीं पंचाक्षरी मंत्र । वेताळ नवचंडी-यंत्र ।
सर्व हालवित सूत्र । प्रभु एक रामराय ॥ १९ ॥
आम्ही तयांचे किंकर । सदा गातो रघुवीर ।
न जाणो मंत्र शाबर । सत्य सत्य जाणावें ॥ २० ॥
तें न मानवे तयांसी । म्हणती हो चोरितसे आम्हांपाशीं ।
बंधन करूं नागपाशीं । म्हणजे वळती येईल ॥ २१ ॥
ऐसे चिंतिती अंतरी । फिरती सद्‌गुरुबरोबरी ।
गांठोनि एका डोंगरी । नागपाश टाकिला ॥ २२ ॥
तत्काळ नाग निर्माण झाले । सर्वांगासी बंधन केलें ।
सद्‌गुरु हांसते तये वेळे । कैसी तृष्णा विद्येची ॥ २३ ॥
उभयतां वदती तयांसी । आम्हां मंत्र सांगावा निश्चयेसी ।
तरीच सोडूं या पाशीं । ना तरी घात घडेल ॥ २४ ॥
गुरु म्हणती आम्ही रामभक्त । आमचा न होय घात ।
तुमचा मंत्र जाईल व्यर्थ । सर्प मृत झालिया ॥ २५ ॥
तामसीविद्येपासोनि । तुम्ही करितसां नरकाची जोडणी ।
यमयातनेची जाचणी । भोगितां सर्व आठवेल ॥ २६ ॥
दो दिवसांचे सुखासाठी । पापें सांठवितां कोटी ।
अजुनी अनुताप घ्या पोटीं । म्हणजे सुख पावाल ॥ २७ ॥
सुख व्हावे शाश्वत । ऐसें करा कांही हित ।
ना तरी बुडाल समस्त । नरककुंडामाझारीं ॥ २८ ॥
साधका सिद्धी नाडती । तुम्हांसी चेटकें बुडविती ।
न जाणतां आपुली गति । दुजियासी काय देतां ॥ २९ ॥
बोध करिती बहुतांपरी । न मानिती ते आसुरी ।
म्हणती करितो फसवेगिती । पाश सोडायाकारणें ॥ ३० ॥
तीन दिवस वाट पाहिली । मग ‘रघुवीर समर्थ’ गर्जना केली ।
डोंगराखाली उडी घेतली । नाग झाले छिन्नभिन्न ॥ ३१ ॥
देखोनि ऐसा चमत्कार । उभयतां वाटला विस्मय थोर ।
सामर्थ्य असतांही धुरंधर । तीन रात्री साहिल्या ॥ ३२ ॥
जाईल आमुचें मंत्रबल । म्हणोनि सोशित हाल ।
तोडिले दुर्भेद्य व्याल । मानवी बल नव्हे हें ॥ ३३ ॥
आधीं बहुत बोध झाला । वरी साक्षात्कार घडला ।
उभयतां अनुताप उपजला । धांवोनि चरण धरियेले ॥ ३४ ॥
अनंत अपराधी मंदमती । बहुत भोगिल्या आपत्ती ।
कृपासागर गुरुमूर्ति । क्षमा दीनांसी करावी ॥ ३५ ॥
म्हणोनि लागती चरणी । कृपा भाकित करुणावाणी ।
सोडवा या भवांतुनी । परमपावन गुरुराया ॥ ३६ ॥
सद्‌गुरु दयाघन वर्षले । मुमुक्षुचातकां शांतविले ।
अनुग्रह देवोन लाविले । रामभक्तीसी ॥ ३७ ॥
दोघे सेवा करिती गहन । एका निरोप देती जाण ।
सच्चिदानंद नामेंकरून । फिरती गुरुसन्निध ॥ ३८ ॥
अतिकठिण सेवा करी । नामें झिजवी वैखरी ।
तुर्याअवस्थेतें वरी । सच्चिदानंद ॥ ३९ ॥
येथेंचि सिद्धि नाडिती । साधका फशीं पाडिती ।
याची अपूर्व कथा धरावी चित्ती । श्रोते साधन सुज्ञ हो ॥ ४० ॥
सद्‌गुरु रामेश्वरा चालिले । आगगाडीस्थानासमीप आले ।
अवकाश जाणोनि बैसले । धर्मशाळेमाझारी ॥ ४१ ॥कांही काळ लोटल्यावरी । गाडी आली अड्ड्यावरी ।
श्रीगुरु पोंचती तंववरी । गाडी चालूं जाहली ॥ ४२ ॥
सच्चिदानंद हें अवलोकून । म्हणे श्रीगुरुवांचोन ।
कोठें धांवतेस ‘कूं’ करोन । स्थिर रहा ॥ ४३ ॥
त्याचे तपसिद्धीचेनि बळे । गाडी पुढें न चाले ।
उपाय करोनि थकले । गाडी चालक ॥ ४४ ॥
सद्‌गुरु मनीं जाणती । बळेंचि विलंब लाविती ।
पाहोन शिष्याची कृति । बोलते झाले ॥ ४५ ॥
‘साधोनिया साधनासी । सिद्धिउपभोग इच्छिसी ।
ही काय आठवली तुजसी । तमोबुद्धि पूर्वींची ॥ ४६ ॥
आम्हां गोसावियांप्रति । जाण्याची काय गडबळ होती ।
उदयीक जाऊं पुढती । तुवां हें काय केलें ॥ ४७ ॥
कलि वाढला दुर्धर । काम्यकर्मीं सकल वर ।
भलताच होईल जोजार । साधनीं व्यत्यय येईल ॥ ४८ ॥
आम्हां सत्वर जाणे असे । तरी काय विलंब असे ।
नेत्र मिटावे स्वल्पसे । मग पहा चमत्कृति’ ॥ ४९ ॥
क्षण एक नेत्र मिटले । शिष्यासह गुप्त झाले ।
उघडोन बा पाहीं । डोळे । रामेश्वरा नमन करी ॥ ५० ॥
सिद्धिची तों ऐसीं स्थिति । परि साधकां ने अधोगती ।
अद्याप न जाय आसक्ति । मुख न दावी द्वादशाब्दें’ ॥ ५१ ॥
बोलोनि ऐसें तयासी । गुप्त झाले सत्वरेंसी ।
प्रकटले इंदुरीं ज्ञानराशी । सद्‌गुरुनाथ एकले ॥ ५२ ॥
कांही काल इंदुरीं राहिले । इकडे रावजी निवर्तले ।
श्रीगुरूंनी मुंडन केले । लोक आश्चर्य करिताती ॥ ५३ ॥
सांगते झाले लोकांसी । आज वडील वैकुंठवासी ।
तिकडे गोंदावलीची स्थिति कैसी । झाली पहा ॥ ५४ ॥
गीताईस दुःख झाले । सत्त्वगुणी रावजी गेले ।
अण्णा बाळ उघडे पडले । कनिष्ठ बंधु सद्गुरूंचे ॥ ५५ ॥
ज्येष्ठ सुतावांचोनि कांही । उत्तरक्रिया होणें नाही ।
ऐसा अभिप्राय सर्वही । विप्रीं काढिला मंथुनी ॥ ५६ ॥
सद्गुरूंचा शोध करिती । आल्यागेल्या विचार पुसती ।
कांही कळेना निश्चितीं । चिंता करिती अनिवार ॥ ५७ ॥
तंव अकस्मात् दशमदिनीं । तेथें आली गुरुजननी ।
मुंडन केले पाहोनि । आश्चर्य करिती लोक सर्व ॥ ५८ ॥
यथासांग क्रिया केली । सवेंचि स्वारी निघोनि गेली ।
सकळां हळहळ वाटली । धांवा करिती गुरूंचा ॥ ५९ ॥
पुनः प्रकटती इंदुरांत । सद्‌गुरु गोसावी वेष सोडीत ।
राजयोग धरिती परिधान करित । कौपीन कफनी फरगूल ॥ ६० ॥
गणेश टोपी शिरीं घालिती । पायीं खडावा वागविती ।
कुबडी स्मरणी झोळी घेती । कार्याकारण ॥ ६१ ॥
उंची वस्त्रें जरतारी । द्वादश शरीरीं ।
केशर अक्षंत शोभे शिरीं । वैष्णवी त्रिपुंड्र ॥ ६२ ॥
एकांतवास सोडिला । शिष्यसमुदाय असंख्य झाला ।
घेती घेवविती नामाला । श्रीरामप्रभूच्या ॥ ६३ ॥
बहुत जन दर्शना येती । अनुग्रह घेतां सुखी होती ।
नित्य उठती भोजनपंक्ति । समाराधना गुरुगृहीं ॥ ६४ ॥
दर्शनमात्रें आनंदवी । नानासंकटी सोडवीं ।
भाविक नास्तिक कामिक लावी । रामभजनीं सकळांसी ॥ ६५ ॥
शास्त्री वैदिक वेदांती । कर्मठ शाक्त सिद्धांती ।
सकलांचे समाधान करिती । श्रेष्ठत्व दाविती नामाचें ॥ ६६ ॥
नाम सकळाचें सार । नाम सकला आधार ।
कलियुगी भवपार । एक नामचि पाववी ॥ ६७ ॥
ऐसा करूनि उपदेश । प्रचीत दाविती जनांस ।
हरिहाट केला कालिकतास । संतसमुदाय मेळवुनि ॥ ६८ ॥
सकलां रामरुप पाहती । नरनारी सेवा करिती ।
मायबापाहूनि प्रीति । सद्‌गुरुवरी सकलांची ॥ ६९ ॥
सद्‌गुरु आमुचा आप्तसखा । सद्‌गुरु आमुचा पाठिराखा ।
सद्‌गुरु चैतन्यचि देखा । सूत्रें हालवी सकलांची ॥ ७० ॥
सद्‌गुरु सन्निध असतां कळिकाळा हाणूं लाथा ।
ऐसें सकलांचे चित्ता । वाटतसे भावबळें ॥ ७१ ॥
वैभव नृपाहून थोर । ‘महाराज’ ऐसें वदती नर ।
गोंदावलें गांवकामगार । गोंदवलेकर कोणी म्हणे ॥ ७२ ॥
सामर्थ्य पाहतां अद्भुत । यास्तव म्हणती समर्थ ।
भक्ति-ज्ञान-वैराग्ययुक्त । सत्पुरुष कोणी म्हणे ॥ ७३ ॥
सद्वस्तु सच्छिष्या दाविती । तेणें सद्‌गुरु कोणी म्हणती ।
गणूबुवा गोंदावलीप्रति । बोलती बालमित्र ॥ ७४ ॥
गुरुदत्त ब्रह्मचैतन्य । नाम असे परम मान्य ।
चैतन्यब्रह्मीं अनन्य । एकरूप जाहले ॥ ७५ ॥
गोंदवलेकर महाराज ऐसें । नाम प्रसिद्ध विशेषें ।
सकल सिद्धांमाजी विलसे । सद्‌गुरु शिरोमणीं ॥ ७६ ॥
चहूं देशी ख्याती झाली । महान् साधु गुरुमाऊली ।
नाना संकटीं पावलीं । बहुतांसी ॥ ७७ ॥
शिष्यशाखा बहु झाली । अनेक साधनी लाविली ।
उपदेश वचनीं निवविलीं । अंतरें कित्येकांचीं ॥ ७८ ॥
कोणी वाद करावया येती । कोणी छिद्रेंचि शोधिती ।
कोणी परिक्षां करूं धांवती । सत्य कीं मिथ्या ॥ ७९ ॥
ज्ञान पाहोनि धरिती मौन । वृत्ति पाहोन होती लीन ।
तेज पाहून म्हणती शरण । नास्तिक आणि विकल्पी ॥ ८० ॥
नित्य भजन अन्नदान । नित्य अध्यात्मविवरण ।
नित्य उत्साह आनंदघन । सद्‌गुरुसन्निध ॥ ८१ ॥
सकलां मुखीं रामनाम । हातीं स्मरणीं संख्या नेम ।
सकलांचें सारिखें प्रेम । श्रीचरणीं ॥ ८२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सहावा
समास चवथा

इंदूरी महत्त्व वाढले । गोंदावल्यासी वर्तमान कळले ।
दादोबा आणि गोपाळ निघाले । स्नेहसंबंधी श्रींचे ॥ १ ॥
समजुतीने आणावयाकारणे । दोघांसी केलें पाठवणें ।
इंदूरी दोघे पाहुणे । आले शोध करित ॥ २ ॥
चरणीं लोटांगण घालिती । गोंदावलीची वार्ता सांगती ।
बहुत दिवस आपणाप्रति । जावोनियां जाहले ॥ ३ ॥
काकू शोक करिते फार । उघडे पडलें घरदार ।
तुम्हांसी आणावया सत्वर । आम्हां उभयतांसी दहाडिलें ॥ ४ ॥
सकलही चिंता करिती । तुम्ही चला शीघ्रगती ।
नानापरीनें सांगती । ज्ञानियासी उभयतां ॥ ५ ॥
बरें म्हणोनि कुरवाळिले । जाऊं म्हणोनि राहविलें ।
स्थिति पाहून चकित झाले । राजयोग साजिरा ॥ ६ ॥
उषःकाली भूपाळ्या म्हणती । मंजुळस्वरें कांकड आरती ।
प्रभात होतां पूजा करिती । चरणतीर्थ प्राशन ॥ ७ ॥
भाळीं शोभे केशरी टिळा । कंठीं घालिती पुष्पमाळा ।
मस्तकीं वाहती तुळसीदळा । भक्त अनेक ॥ ८ ॥
नानापरींचे नैवेद्य । देवोनि धरिती श्रीगुरुपद ।
सर्वांस वांटिती प्रसाद । सद्‌गुरु स्वहस्तें ॥ ९ ॥
नित्य समाराधना होती । बहुपरींची पक्वान्नें करिती ।
किती खाती जेवती । गणती नाही ॥ १० ॥
रोगग्रस्त पिशाचग्रस्त । आपत्तीनें जाहले व्यस्त ।
विनवणी करिती समस्त । उद्धरी आम्हां दयाळा ॥ ११ ॥
कोणी दारिद्र्यें त्रस्त झाले । कोणी व्यंगत्व पावले ।
निपुत्रिकही तेथें आले । पुत्रवांछा धरोनि ॥ १२ ॥
आशा मूळ प्रकृती । कामना अनंत उठती ।
कोणी करावी गणती । आर्त तितुके धांवले ॥ १३ ॥
तैसेचि बद्ध मुमुक्षु । साधक आणि जिज्ञासु ।
धांवती सेवाया रसु । गुरुवाक्यबोध ॥ १४ ॥
ऐसिया गर्दीत गवसले । कार्या आलेले विसरले ।
बहुतां दिवशीं स्मरण झालें । उभयतांसी गोंदवलीचें ॥ १५ ॥
पुनः प्रार्थना करिती । सत्वर चला हो म्हणती ।
महाराज अनुमोदन देती । कठिण वाटे सकळांसी ॥ १६ ॥
बेत ठरविला जाण्याचा । निरोप घेती सकळांचा ।
नयनीं पूर अश्रूंचा । लोटतसे भक्तांचिया ॥ १७ ॥
पुनरपि येऊं परतोन । ऐसें देती आश्वासन ।
निघते झाले तेथून । गोंदावलीसी पातले ॥ १८ ॥
आनंद झाला सर्वांसी । भेटले लहान थोरांसी ।
महाराज आले ग्रामासी । गांवोगांवी वार्ता गेली ॥ १९ ॥
भक्तमंडळी धांवली । यात्रा भरली गोंदावली ।
नामनौबत दुमदुमली । भक्तिप्रेम स्फुरतसे ॥ २० ॥
खातवळी पाठविला दूत । भार्या आणविली त्वरित ।
संसारी राहोनि वर्तत । अलिप्तपणें विदेही ॥ २१ ॥
घरची व्यवस्था लागली । माता बोधें शांतविली ।
अण्णांनी देहयात्रा संपविली । सद्‌गुरुसन्निध ॥ २२ ॥
मुक्ताबाई बहीण सती । खातवळी दिली होती ।
तीही गेली स्वर्गाप्रति । अल्पवयामाझारी ॥ २३ ॥
सरस्वती माय गरोदर राहिली । ओट्या भोजनें चालली ।
सद्‌गुरु म्हणती काय भुली । पडली या लोकांसी ॥ २४ ॥
नऊ मास पूर्ण झाले । पुत्ररत्न जन्मास आले ।
परि बारसें नाही करूं दिले । अल्पायुषी जाणोनि ॥ २५ ॥
एक संवत्सराआंत । पुत्र झाला असे मृत ।
तदुपरि मायहि जात । पुत्रासी भेटाया ॥ २६ ॥
असो स्नुषा निवर्तली । गीता माउली दुःखी झाली ।
सद्गुरूंनी माया त्यजिली । वृत्तिशून्य होवोनि ॥ २७ ॥
ऐसा काही काळ निघोन गेला । गीताबाईनें आग्रह धरिला ।
दुजा विवाह पाहिजे केला । पुरवी आस येवढी ॥ २८ ॥
हो ना करिता रुकार । देते झाले गुरुवर ।
स्वयें शोधून सुंदर । आणीन मी नोवरी ॥ २९ ॥
आश्वासुनी मातेसी । गेले आटपाडी महालासी ।
वधु शोधिली सुंदरसी । दोनीं नेत्रीं आंधळी ॥ ३० ॥
बहुत कन्या दाविती । परि सर्वही नाकारिती ।
सखारामपंतांची करिती । सुलक्षणी कन्या पसंत ॥ ३१ ॥
देशपांडे उपनाम ब्राह्मण । चिंता करी रात्रंदिन ।
कन्या असे नेत्रहीन । वर कैंचा मिळेल ॥ ३२ ॥
तंव महाराज अवचित । आळशावरी गंगा लोटत ।
तैसे पावले तेथ । पूर्वपुण्य वधूचें ॥ ३३ ॥
पाहोनि हस्तरेषा । जोडा जमला म्हणती खासा ।
परि मी गोसावी ऐसा । विचार करूनि पाहावें ॥ ३४ ॥
शिळें खावोनि उदर भरणें । त्यासी वाढिली पक्वान्नें ।
तैसें जाणोनि पितयानें । तिथिनिश्चय ठरविला ॥ ३५ ॥
आटपाडीस झाले लग्न । भार्येसह गोंदावलीस जाण ।
येवोनि वंदिले चरण । माउलीचे उभयतां ॥ ३६ ॥
मायगृहीं यमुना म्हणती । सासरीं जाहली सरस्वती ।
आईसाहेब सकळ वदती । शिष्यवर्ग ॥ ३७ ॥
पुनरपि गृहस्थाश्रम । धरिला जो दे आराम ।
तीन्ही आश्रमां परम । साह्यकारी ॥ ३८ ॥
ऐसे गेले कांही दिवस । उपासना वाढली विशेष ।
गृहीं बांधावें मंदिरास । योजिलें मनीं ॥ ३९ ॥
तडवळें येथील कुळकर्णीं । त्यांनी राममूर्ति कोदंडपाणी ।
लक्ष्मणा सीता ऐशा तिन्ही । आणविल्या होत्या ॥ ४० ॥
राममंदिर बांधावयाला । पैसा बहुत जमविला ।
परि सर्वही खर्चिला । वाडा बांधविला सुरेख ॥ ४१ ॥
तेणें ईश्वरी क्षोभ होय । गृह दग्ध होवोनि जाय ।
परि मूर्तीसी न घडे अपाय । अघटित करणी देवाची ॥ ४२ ॥
ठेविल्या होत्या गृहांत । तयासी कळली मात ।
गोंदावलेकर भगवद्भक्त । गृहीं मंदिर योजिताती ॥ ४३ ॥ तयाने आणोन दिधल्या । म्हणे या सार्थकीं लागल्या ।
गुरुगृही कैशा शोभल्या । मूर्ति नव्हे प्रत्यक्ष रूप ॥ ४४ ॥
भक्ताधीन पुरुषोत्तम । भक्तहृदयी आत्माराम ।
भक्तगृहीं शोभतो परम । दर्शनें श्रमपरिहार ॥ ४५ ॥
कुंभार सरवीर कामगार । परम कुशल चतुर ।
तयाकरवीं श्रींचे मंदिर । शके अठराशें तेरांत बांधिले ॥ ४६ ॥
म्हसवडकर बापूसाहेब माने । श्रीमंत असोन सत्त्वगुणें ।
युक्त होते तयांनी । केली मेघडंबरी ॥ ४७ ॥
तैसेंचि बांधिले सिंहासन । कुसरी आणि शोभायमान ।
वरी बैसविले ठाण । रामसीता लक्ष्मणा ॥ ४८ ॥
स्थापनोत्साह अपूर्व झाला । वैदिकसमुदाय जमविला ।
रामचरणां भेटी आला । महानद्यांसह सागर ॥ ४९ ॥
अन्नपूर्णा जाहली उदार । केला गांवभंडार ।
भक्ताधीन परमेश्वर । मग काय उणें ॥ ५० ॥
प्रत्यक्ष ठाकला श्रीराम । जेथें अनंत पावले विश्राम ।
पावती, पावतील, परम- । भाग्यें घडे दर्शन ॥ ५१ ॥
जेथे वसे नाम सतत । वाटे सजीव बोलत ।
समोर उभा हनुमंत । हस्तद्वय जोडोनी ॥ ५२ ॥
देव भक्त आणि नाम । अपूर्व त्रिवेणीसंगम ।
पीडित पावती आराम । ध्यान दर्शन केलिया ॥ ५३ ॥
ध्यान सतेज गंभीर । हास्यमुद्रा, चापशर ।
शोभतसे हस्तकीं , साक्षात्कार । नित्य घडती ॥ ५४ ॥
एकदां ऐसा प्रकार घडला । महाराज करितां भजनाला ।
करीं रामप्रसाद आला । गुलाबकुसुमें ॥ ५५ ॥
पुढें महाराज काशीस निघाले । तेव्हां रामनयनीं अश्रु आले ।
सत्वर येऊं म्हणतां राहिले । जन समस्त पाहती ॥ ५६ ॥
साक्षात् उभे अयोध्यावासी । निश्चयें वाटे सर्वांसी ।
ऐसेपरी मंदिरासी । स्थापना केली गृहामाजीं ॥ ५७ ॥
एके दिवशी गीता माउली । गणपतीसी बोलूं लागली ।
एक इच्छा असे राहिली । महायात्रेची ॥ ५८ ॥
स्नान घडावें भागीरथीचें । दर्शन श्रीविश्वेश्वराचें ।
सार्थक होईल देहाचें । ऐसें करी सत्वर ॥ ५९ ॥
पुरविण्या मातेची आस । निघाले काशीयात्रेस ।
भार्या धाडिली माहेरास । पुढें जाऊं म्हणोनिया ॥ ६० ॥
सदनावरी तुळसीपत्र ठेविलें । विप्रांकरवीं लुटविलें ।
लोभमूळ संसारजाळें । तोडिले मायेचें ॥ ६१ ॥
दहा वेळां काशी केली । म्हणता पायवाट पडली ।
संगें मंडळी निघाली । शेंपन्नास ॥ ६२ ॥
काशीस गेले आजवरी । परि एकले पादचरी ।
तैसे नव्हे या अवसरीं । विश्वकुटुंबी जाहले ॥ ६३ ॥
प्रयागीं गंगाभेट केली । वेणीमाधवाचरणीं घातली ।
तीर्थश्राद्धें सकल केलीं । अक्षयवट दाविला ॥ ६४ ॥
दाविला त्रिवेणीसंगम , दुर्ग त्रिकोणी दुर्गम ।
करविला दानधर्म । माउलीहस्तें ॥ ६५ ॥
त्रिरात्र करोनि वसति । निघाले श्री काशीप्रति ।
जेथें नांदे उमापति । भूकैलास प्रत्यक्ष ॥ ६६ ॥
लिंगमय दिसे काशी । दर्शनें जी अघ नाशी ।
ती दाविली मातेसी । गंगा आणि मनकर्णिका ॥ ६७ ॥
धुंडिराज दंडपाणी । अष्टभैरव दावोनी ।
मग विश्वेश्वर भवानी । करविलें दर्शन । ॥ ६८ ॥
दानधर्म बहुत केला । करिती तीर्थश्राद्धाला ।
विप्रसमुदाय तोषविला । षड्रस अन्नें अर्पोनि ॥ ६९ ॥
पंचक्रोशी अरुणा अशी । दाविली श्रीव्यासकाशी ।
मनीषा पुरवोनि ऐशी । गयाक्षेत्रीं निघाले ॥ ७० ॥
विष्णुपदीं अर्पिला पिंड । जो चुकवी यमदंड ।
धर्म करूनि उदंड । पंड्यांची हांव शमविली ॥ ७१ ॥
बेचाळीस कुळें उद्धरिली । अन्य अनंत तारिलीं ।
परि लौकिक करणी केली । गुरुमाउलीनें ॥ ७२ ॥
मार्गीं बहु जन अनुग्रह घेती । दर्शनें समाधान पावती ।
बोलका देव प्रत्यक्ष म्हणती । पावला आम्हां ॥ ७३ ॥
धर्मकेंद्र काशीपुर । तेथें नामाचा केला गजर ।
शास्त्री पंडित विद्वान थोर । रामभजनीं लाविले ॥ ७४ ॥
जेथें कर्मठ ब्राह्मण । भक्तिपंथा करिती छळण ।
तयांसी प्राकृत नामस्मरण । करावया लाविले ॥ ७५ ॥
काशीनिवासी विद्वान थोर । बाबूभट नामें द्विजवर ।
सद्गुरूंचे झाले किंकर । वास करिती श्रींजवळी ॥ ७६ ॥
कलियुगीं नामचि सार । दावोनि तारिले अपार ।
धन्य कुळ धन्य संसार । जे गुरुवचनी विश्वसले ॥ ७७ ॥
असो करोनि त्रिस्थळी । अयोध्ये आले भक्तबळी ।
मातृआज्ञा प्रतिपाळी । ऐसा विरळा ॥ ७८ ॥
अयोध्यें गीता माउली । अकस्मात् विकृति पावली ।
देहयात्रा संपविली । पुण्यक्षेत्रीं ॥ ७९ ॥
दशदानें सुवर्णदानें । सवत्स दुभती गोप्रदानें ।
विहित तितुकीं दिधलीं दानें । सच्छील द्विजांसी ॥ ८० ॥
नामोत्साह करविला । अन्न वांटले गरिबांला ।
अंतकाळ सांग केला । माउलीचा ॥ ८१ ॥
समुदाय पाठविला ग्रामाप्रति । नैमिष्यारण्यीं स्वयें जाती ।
पुनरपि एकदां अयोध्येप्रति । स्वारी आली यात्रेसी ॥ ८२ ॥
दहिवडीकर जानकीबाई । विनोदें वदती तिजसी पाही ।
सोबतीस तुम्ही राहतां काई । माउलीचे आमुच्या ॥ ८३ ॥
पुण्यक्षेत्र शरयूतीर । वरी सन्निध सद्‌गुरुवर ।
जाणोन देत प्रत्युत्तर । हो जी, हो जी, म्हणोनि ॥ ८४ ॥
निमित्तमात्र आला ज्वर । ठेविलें तिनें कलेवर ।
मुक्तिदाता सद्‌गुरुवर । सुसंधि साधिली ॥ ८५ ॥
तिजसीही तिलांजली । सद्गुरूंनी स्वये दिली ।
अनंत सुकृतें फळा आलीं । धन्य जाहली उभयलोकीं ॥ ८६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सहावा
समास पाचवा

नमन करूं सीतापती । कोदंडधारी श्याममूर्ती ।
कमलनयन दिव्यकांती । महामेरू सत्त्वाचा ॥ १ ॥
विश्वामित्रा साह्य केलें । असुर सर्व संहारिले ।
चरणस्पर्शें पावन केलें । अहिल्यासतीसी ॥ २ ॥
साष्टांगेंसी प्रणिपात । करूं सद्भावनायुक्त ।
गुरुलीला अगम्य बहुत । दासामुखीं वदवावी ॥ ३ ॥
सद्‌गुरु गेले नैमिषवनीं । राहिले एकांत साधूनि ।
उद्धरावया अज्ञानी । पुन्हां इंदुरीं पावले ॥ ४ ॥
सकळांसी श्रुत झाले । गुरुमहाराज येथें आले ।
आनंदोर्मीनें धांवले । गुरुदर्शनाकारणें ॥ ५ । ।
पंचक्रोशी दशक्रोशी । लोक येती दर्शनासी ।
आनंदीआनंद सर्वांसी । होता झाला ॥ ६ ॥
तेथोन आले हर्द्याप्रति । जेथें सुज्ञ विप्र वसती ।
तेथेंही उपासना वाढविती । अनुग्रहप्रसाद देवोनि ॥ ७ ॥
काशीनाथ भैय्या सावकार । तयांकरवीं बांधविलें मंदिर ।
पट्टाभिषिक्त राम सुंदर । स्थापना केली श्रीगुरूंनी ॥ ८ ॥
पूजा नैवेद्य दीप जाण । आल्या अतिथा अन्नदान ।
व्हावया शेती करोन । दिधली असे समर्थें ॥ ९ ॥
महादेवभट्ट इंदोरकर । पुजारी नेमिला सत्त्वस्थ फार ।
बहुत दिवस गुरुवर । सकुटुंब तेथें राहती ॥ १० ॥
उपरि गोंदवलीस आले । अपरिमित भक्त झाले ।
रामनाम जप चाले । चहूंकडे सारिखा ॥ ११ ॥
एक कोट तीन कोट । कोणी करिती तेरा कोट ।
पापाची बुडविली मोट । पापकर्मीं कलियुगीं ॥ १२ ॥
कोणी बद्धाचे साधक झाले । कोणी सिद्धपदवी पावले ।
कोणी वैराग्यातें धरिले । शीळेमाजीं सद्गुरूंचे १३ ॥
चित्तशुद्धि पावले झणीं । झाले दीक्षेचे अधिकारी कोणी ।
कोणी सद्‌गुरुरूप होवोनि । सर्वाधिकारी जाहले ॥ १४ ॥
कोणा चिंतामणि गवसोन । आळसे दारिद्र्य भोगिती जाण ।
ऐसे अभागी किती जन । होवोनि गेले ॥ १५ ॥
नित्य उत्साह गुरुगृहीं । आनंदासी सीमा नाही ।
धनिक गरीब सर्वही । नांदती एके ठायीं ॥ १६ ॥
विद्वान आणि अज्ञानी । पुरुष आणि मायबहिणी ।
नांदती सद्‌गुरुसदनीं । मत्सररहित नीतीनें ॥ १७ ॥
सुधारणा पुराण मतवादी । सात्विक राजस तमोबुद्धि ।
आळशी दक्ष वाग्भेदी । एके छत्रीं वावरती ॥ १८ ॥
व्याघ्रा आणि अजापुत्रा । दरवेशी बांधी एकसूत्रा ।
तेवीं सद्‌गुरुतपस्तेजछत्रा- । खालीं निर्वैर नांदती ॥ १९ ॥
सकळांचें ध्येय एक । सकळां साधनही एक ।
गुरुकृपा मजवरी अधिक । वाटतसे प्रत्येका ॥ २० ॥
बाल तरुण आणि वृद्ध । सकलां सारिखा संवाद ।
रोगासारिखें औषध । वैद्य जैसें देतसे ॥ २१ ॥
शक्ति पाहोन सेवा सांगती । कामिकांच्या कामना पुरविती ।
आशासूत्रासी वळविती । भक्तिमार्गें हळूं हळूं ॥ २२ ॥
जाणोनि सकळांचे अंतर । तेचि देती प्रत्युत्तर ।
खूण पटतां साक्षात्कार । समाधान होतसे ॥ २३ ॥
कोट्यावधि शिष्य झाले । सकलांतरी गुरु खेळे ।
साधनी अडले भुलले । त्यांसी लाविती मार्गासी ॥ २४ ॥
कोणा प्रत्यक्ष सांगत । कोणा होय दृष्टांत ।
दुजें रूप धरोनि हेत । पुरविती कोणाचा ॥ २५ ॥
ज्यानें संकटीं करुणा भाकिली । तेथें सत्वर धांव घाली ।
ऐसी सद्‌गुरुमाउली । संकटकालीं पावतसे ॥ २६ ॥
उदय होतां गभस्ती । साधन बिंबें प्रकाशती ।
तैसी ही गुरुमूर्ती । सर्वां घटीं वास करी ॥ २७ ॥
सद्‌गुरुकृपाप्रकाशें । साधन होई उल्हासें ।
न पडती संसृतीचे फांसे । तयावरी ॥ २८ ॥
शुद्ध भाव जयापाशी । तया अनुभवाच्या राशी ।
देशीं असो वा विदेशीं । सदा सन्निध महाराज ॥ २९ ॥
शिष्य जरी झोंपी जाये । तरी सद्‌गुरु उभा आहे ।
जाणोनि अपाय उपाय । साह्य करी सर्वदा ।। ३० ॥
जैसी होय चित्तशुद्धी । तैसी क्रिया साधनविधी ।
लावोनिया भवनदी । तारोनि नेती गुरुराव ॥ ३१ ॥
कोणा घाली कौपीन । कोणा कफनी टोपी पूर्ण ।
कोणा धरविती मौन । कांही कालपर्यंत ॥ ३२ ॥
कोणा सांगती गुरुसेवा । कोणा म्हणती देव पुजावा ।
कोणा एकांत सेवावा । ऐसी आज्ञा होतसे ॥ ३३ ॥
ब्रह्मचर्य कोणा सांगती । कित्येकांची लग्नें करिती ।
कोणाच्या जटा वाढविती । कोणाचें करविती मुंडण ॥ ३४ ॥
कोणा करविती सन्निध वास । कित्येकांसी दूर देश ।
गृहीं बैसोन जपास । कित्येकांस करविती ॥ ३५ ॥
कोणा देउनिया दीक्षा । मागविती नित्य भिक्षा ।
’ॐ भवति’ या पक्षा । रक्षण करविती ॥ ३६ ॥
कोणा करवी देवालय । बांधविती सद्‌गुरुराय ।
’आल्या अतिथा द्या आश्रय’ । ऐसी आज्ञा होतसे ॥ ३७ ॥
सिद्ध झाले शिष्य थोर । तयां देती अधिकार ।
करावा आतां जगदुद्धार । भक्तिपंथ वाढवावा ॥ ३८ ॥
जाणोन अंतरस्थिति । वर्तमान-भूत-भविष्यगति ।
कठिण सुलभ आज्ञा करिती । भक्तांलागीं दयासिंधु ॥ ३९ ॥
पाहतां सद्‌गुरुदरबार । वाटे हें कैलास शिखर ।
भूतगण दिसती फार । चित्रविचित्र ॥ ४० ॥
वरि सांगितले वेष । आणिक प्रकार बहुवस ।
माळा मुद्रा मणी विशेष । असती तयांमाझारी ॥ ४१ ॥
यावरी हें सुधारणायुग । अनंत वेषें नटलें जग ।
वर्णन करितां दिसेल व्यंग । महाराष्ट्रबोलीं ॥ ४२ ॥
चिंधी बांधिती गळ्यांत । हाडकें हातीं कंठांत ।
निर्जीव चर्म वागवीत । मस्तकावरी कित्येक ॥ ४३ ॥
निष्कारण आंधळे किती । नेत्रां उपनेत्र लाविती ।
रोगग्रस्तासारिखे किती । झांकिती हातपाय ॥ ४४ ॥जैसा देश तैसा वेष । धरितां लाहिजे सुखास ।
ना तरी हा हव्यास । काचोळा करील त्वचेचा ॥ ४५ ॥
ऐसे दिसती बहु प्रकार । सांगतां होय ग्रंथविस्तार ।
नाना देशींचे नर । रीतिरिवाज वेगळे ॥ ४६ ॥
एकाचें एका कळेना । ऐसे भाषाप्रकार नाना ।
हिंदुस्थानी कानडी जाणा । तेलुगु-गीर्वाणादिक ॥ ४७ ॥
कोणी पिशाचें झाले ग्रस्त । कोणा रोगें केलें ग्रस्त ।
कोणी भ्रमाने बरळत । भूतगण समर्थांचे ॥ ४८ ॥
सकल चरण सेवा करिती । पाहतां चित्रविचित्र दिसती ।
वाटे दुजे भूतपति । महाराज आमुचे ॥ ४९ ॥
वैदिक शास्त्री विद्वान । गरीब आणि धनवान ।
संगतिसुखालागोन । सकुटुंब राहती ॥ ५० ॥
ऐसा कुटुंबियांचा संसार । चालविती गुरुवर ।
विश्वकुटुंबी म्हणती नर । याचसाठीं ॥ ५१ ॥
आणिकही श्रेष्ठ भक्त । ऐसे होते बहुत ।
नित्य येती जाती तयांस । सीमा नाही ॥ ५२ ॥
भाऊसाहेब केतकर । बापूसाहेब पाटखळकर ।
जतकर फारिष्टर । शाळिग्राम व गुरुजी ॥ ५३ ॥
दादोबा अंताजीपंत । व्यंकण्णभट गोडसे वदत ।
रामशास्त्री व पिटके वंदित । वाईक्षेत्रनिवासी ॥ ५४ ॥
गोविंद नामें आळतेकर । पोतनीस जाहगीर ।
सखारामपंत देशपांडे श्वशुर । रामपूजे लाविले ॥ ५५ ॥
मुक्ताबाई परम भक्त । श्रीचरणी देह ठेवित ।
मथूबाई विख्यात । सेवा करी गुरूची ॥ ५६ ॥
अम्मानामें मद्रासी । देहकष्ट बहु सोसी ।
द्वादश वर्षें मौनासी । धरिती झाली गुरुआज्ञें ॥ ५७ ॥
जर लोकर रेशीम । सुबक करी विणकाम ।
शोभवी सद्‌गुरु श्रीराम । भक्तिभावें करोनि ॥ ५८ ॥
चंद्राबाई परमभक्त । मंदिरीं वाची भागवत ।
ताई सुस्वर गाणीं गात । बेळगांवची रहिवाशी ॥ ५९ ॥
आणिकही भक्त बहु असती । नित्य गुरुसेवा करिती ।
भाग्य आलें उदयाप्रति । तेही भोगिती आनंद ॥ ६० ॥
बुवा शास्त्री रामदासी । साहेब पंत संन्यासी ।
राव भट्ट ब्रह्मचार्यांसी । सीमा नाही ॥ ६१ ॥
मामलेदार न्यायाधीश । सरवीर आणि फडणवीस ।
वैद्य जाती विशेष । तात्या नामें संबोधिती ॥ ६२ ॥
अठरापगड याती जमती । सकलां एकरूप पाहती ।
सांभाळोनि धर्मनीति । नाम घेवविती मुखानें ॥ ६३ ॥
सेवाप्रकार बहु असती । अल्प बोलूं संकेतीं ।
जेणें श्रवण पावन होती । भाविकांचे ॥ ६४ ॥
अखंड मुखीं रामनाम । हा एक मुख्य नेम ।
द्यान पूजा अध्यात्म । अवतारलीला वर्णावी ॥ ६५ ॥
याहीवरी सद्‌गुरुसेवा । सेविती सुखाचा ओलावा ।
तोही प्रकार परिसावा । श्रोतेजनीं ॥ ६६ ॥
कोणी खडावा धरिती । कोणी छत्र वागविती ।
पीक पात्र धरोनि हातीं । कोणी उभे सर्वदा ॥ ६७ ॥
कफनी फरगुल कौपीन । पात्रें पडशी भरोन ।
उभे नित्य सन्निधान । सद्गगुरुपाशीं ॥ ६८ ॥
ऐसें करावया कारण । शेती पाहावया फिरतां जाण ।
तैसेचि जाती ग्रामालागून । क्वचित्काळीं बहु दूर ॥ ६९ ॥
कोणी पाय चेपती । कोणी अंग रगडती ।
ऊष्णकाळीं पंखा वारिती । कितीएक ॥ ७० ॥
कोणी आणिती पाणी । सडासंमार्जन कोणी ।
देह अर्पिती सद्‌गुरुचरणीं । अनन्य भक्त नरनारी ॥ ७१ ॥
सेवा सुलभ वा कठिण । घेवोन करिती समाधान ।
येरवीं विदेहालागून । चाड नसे किमपिही ॥ ७२ ॥
कोणा मनीं विकल्प येतां । तात्काळ दाविती विदेहता ।
भक्तालागीं झाली माता । गरजवंत ॥ ७३ ॥
कोणी गाडी ओढती । कोणी उचलोन नेती ।
कोणी संगें धावती । घोड्यावरी बैसतां ॥ ७४ ॥
फौजदार भिकाजी श्रीपत । बताशा घोडा अर्पित ।
वाण सुंदर परि मस्त । कोणासही नावरे ॥ ७५ ॥
परि वरी बैसतां माऊली । निमुट चाले सरळ चालीं ।
क्वचित् स्वारी नाहीं झाली । तरी घाली धिंगाणा ॥ ७६ ॥
गुरुसेवेची आवड भारी । मूक म्हणोनि दंगा करी ।
महाराज बसतां वरी । वार्यासारिखा धांवतसे ॥ ७७ ॥
शाहूराव चिवटे यांसी । घोडा दिधला पाळावयासी ।
तेथें तीन दिवस उपवासी । नेत्रीं येती अश्रुधारा ॥ ७८ ॥
परत दिधला आणोन । अश्व नव्हे सामान्य ।
हा भक्त दिसे अनन्य । वाहन एक श्रीगुरूंचे ॥ ७९ ॥
गंगी नामें गाय लंगडी । सद्‌गुरुरूपीं झाली वेडी ।
कुरवाळितां राहे उगडी । तोंवरी मागें हिंडतसे ॥ ८० ॥
वासना भूतें झडपिती । तींही सेवा करिती ।
संगतीनें उपरम पावती । तामसी बुद्धि सोडोनि ॥ ८१ ॥
आम्हां पिशाच्चयोनींतून । सोडवा, सेवा करूं गहन ।
तुमचें घडलें दर्शन । मुक्त करा दयाळुवा ॥ ८२ ॥
दुष्टबुद्धि पिशाच्चगण । त्यांचेंही पालटे मन ।
कैसें आमुचें अज्ञान । प्रपंचमोह सुटेना ॥ ८३ ॥
मानव भूतें मूक प्राणी । सेवा करिती अखंड चरणीं ।
सद्‌गुरु समस्तांलागोनि । रामरूप पाहती ॥ ८४ ॥
अनंत येती आणि जाती । सकळांवरी सारखी प्रीति ।
आलिया जेवूं घालिती । निघतां बांधिती शिदोरी ॥ ८५ ॥
दर्शना येती सुवासिनी । खणानारळें ओटी भरोनी ।
लेकुरां अंगीटोपी करोनी । आनंदे बोळविती ॥ ८६ ॥
नाना सांसारिक संकटें । निवारिती युक्तिवाटें ।
घरच्याहून प्रिय मोठे । वाटती लहानथोरां ॥ ८७ ॥
नाना हितगुजें सांगती । कन्या जशी माउलीप्रति ।
तैसी सकलां गुरुमूर्ति । संकटकालीं तारितसे ॥ ८८ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः पंचमः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सहावा
समास सहावा

नमोप्रचंडकोदंडविहारी । जनकदुहिताचित्तहारी ।
दशमुखदर्पविदारी । अयोध्याधीशा ॥ १ ॥
भार्गवरामा लाजविले । क्षत्रियतेज ऊर्जित केले ।
दशरथात्मजा चरणयुगुले । कृपा करोनि दाखवी ॥ २ ॥
श्रीसद्गुरूंचा संसार । नित्य चाले जगदुद्धार ।
वर्णितां शिणले अपार । म्यां पामरें काय बोलावें ॥ ३ ॥
परि मनें धरिली हांव । कौतुक पुरवी गुरुराव ।
आवडीचा नसे ठाव । त्रिभुवनीं दुजा ॥ ४॥
नित्य नवी आवडी उठो । मन ये चरणी लिगटो ।
वासनासंसार फाटो । ही विनंती माझी ॥ ५ ॥
बहुतांचे संसार शिरीं । घ्यावयाची हौस भारी ।
तेवीं माझा म्हणतो तोहि करीं । धरोनि घालवी मोहातें ॥ ६ ॥
असो गुरुगृहींची स्थिति । दृढ धरा एकचित्तीं ।
जेथें नांदे रमापति । सकलां घटीं दृग्गोचर । ॥ ७ ॥
आईसाहेब सत्त्वशील । प्रसूत झाल्या तीन वेळ ।
दोन कन्या एक बाळ । यथाकाल क्रमानें ॥ ८ ॥
परि तीं नाहीं जगली । बाळपणीं स्वर्गीं गेलीं ।
शांतिनामें होती राहिली । तीन वर्षेंपर्यंत ॥ ९ ॥
सिद्धांचिया पोटी । यावया पुण्यकोटी ।
आत्मा प्रत्यक्षपणें उठी । अधिकार नव्हे सामान्य ॥ १० ॥
जे मोक्षाचे अधिकारी । परि राहिली कांही कुसरी ।
तेचि जन्मती या घरीं । प्रारब्धशेष भोगाया ॥ ११ ॥
मातुःश्रींसी लोभ फार । भक्त येती अनिवार ।
वस्त्रेंभूषणें धन अलंकार । अर्पिती गुरुमायेसी ॥ १२ ॥
त्या आदरें संरक्षिती । कधीं कोणाही न देती ।
लोभ विघातक परमार्थीं । जाणिलें गुरुदेवें ॥ १३ ॥
तेव्हां ऐसा प्रकार घडला । आईसाहेबां ज्वर भरला ।
वाढतां वाढतां वाढला । सर्व झाले भयभीत ॥ १४ ॥
सद्‌गुरु वदती ते समयीं । ’आतां तुझा नेम नाहीं ।
सर्वस्व अर्पीं द्विजपायीं । भक्तिभावें करोनिया’ ॥ १५ ॥
संकल्पें उदक सोडविलें । झांकले तें बाहेर काढले ।
द्विजस्त्रियांसी अर्पिले । स्वहस्तें श्रीगुरूंनीं ॥ १६ ॥
उंची वस्त्रें भरजरी । अलंकार रत्नें गोजिरी ।
विप्रां भासे शनि उदरीं । आजिं आला आम्हांसी ॥ १७ ॥
अंगावरील वस्त्राविण । सर्वही लुटविता जाण ।
प्रकृतीस आला गुण । अघटित करणी सद्गुरूंची ॥ १८ ॥
याउपरि कन्या एक । श्रीगुरु घेती दत्तक ।
वर पाहोन सुरेख । दान करिती सालंकृत ॥ १९ ॥
तिचें विठाबाई नांव । मार्डीकर वासुदेवराव ।
चतुर सुगुणी सवैभव । जामात केला तयासी ॥ २० ॥
लग्नसोहळा चालूं असतां । अद्भुत घडली वार्ता ।
श्रवण करितां सद्‌गुरुसत्ता । कळों येईल ॥ २१ ॥
गांवोगांवींचे पाहुणे । आले घेवोनि वाहनें ।
त्यांतील एक घोडें तरणें । बांधिले होतें मांडवीं ॥ २२ ॥
तों काय झाली मात । अश्व अकस्मात झाला मृत ।
विप्र जमोनि विचार करीत । आतां कैसें करावें ॥ २३ ॥
अंत्यज आणिला मांडवांत । शुभकार्या अशुभ होत ।
आम्हीं नेतांही अनुचित । दिसेल कीं निश्चयें ॥ २४ ॥
बहुत चिंतेमाजीं पडले । महाराजांसी श्रुत केलें ।
काय उचित ये वेळें । सांगा तुम्ही सर्वज्ञ ॥ २५ ॥
महाराज म्हणती द्विजांसी । पाहूं चला अश्वासी ।
निजले असेल समयासी । तुम्हां वाटे मृत झालें ॥ २६ ॥
अश्वासमीप जावोनि । कृपादृष्टीं पाहती झणीं ।
वरदहस्तें कुरवाळोनि । म्हणती चैतन्य संचरले ॥ २७ ॥
तंव काय नवल झालें । घोडें झडकरी उठलें ।
चारा खावों लागलें । देखत देखतां ॥ २८ ॥
आश्चर्य वाटलें सकळांसी । अघटित घटना केली कैसी ।
साक्षात् ईश्वर निश्चयेंसी । लोकोद्धारा अवतरले ॥ २९ ॥
नयनीं आनंदाश्रु आले । सर्वांगी रोम थरारले ।
क्षणक्षणा नमवूं लागले । चरणांवरी मस्तक ॥ ३० ॥
असो विवाह सांग झाला । सकलां आनंद वाटला ।
संतति संपत्तिनें भरला । संसार विठाईचा ॥ ३१ ॥
यापरी आणिक किती । गरिबांचे विवाह करिती ।
जांवयांस नाहीं मिती । त्यांत मुख्य सप्तक ॥ ३२ ॥
सुखवस्तु श्रीमान । सात साहेब मुख्य जाण ।
संगतीसखा लागोन । नित्यवास गुरुगृहीं ॥ ३३ ॥
बहुत सिद्ध होवोनि गेले । त्यांत चौदा मुख्य गणिले ।
साधनीं अनंत लागले । सीमा नाहीं ॥ ३४ ॥
कोणी बद्धचि राहिले । कोणी मुमुक्षु झाले ।
कनिष्ठ उत्तम भले । शिष्य झाले अपार ॥ ३५ ॥
मायबाप सासू श्वशूर । कांता पति कन्या कुमर ।
इष्टमित्रांहून गुरुवर । प्रिय वाटती सकळांसी ॥ ३६ ॥
हितगुज गोष्टी सांगती । युक्ति प्रयुक्ति बोध घेती ।
जेणें होय दुःखमुक्ती । विनविती ते गुरुराया ॥ ३७ ॥
कोणा साधन नामस्मरण । कोणाकरवीं अनुष्ठान ।
करवोन दुःखें हरण । करिती ते सकळांचीं ॥ ३८ ॥
शिष्यसमुदाय रामभक्त । त्यां देवाहून प्रिय संत ।
परि श्री वदती हें उचित । नोहे बापा ॥ ३९ ॥
आधीं देवा नमावें । मग गुरूंसी वंदावें ।
परि ते कोणी आयकावें । बोलका देव आमुचा ॥ ४० ॥
जनीं जनार्दन ओळखिला । तो स्वयेंचि देव झाला ।
प्रत्यक्ष सांडोन प्रतिमेला । पुसे कोण ॥ ४१ ॥
अनंत अन्याय क्षमा करिती । परि अहंकार नावडे गुरुमूर्ती ।
साक्षात्कारें छेदन करिती । क्षण एक न लागतां ॥ ४२ ॥
जाणोन परांचे अंतर । नेमकें देती प्रत्युत्तर ।
ऐसा घडतां साक्षात्कार । समाधान पावती ॥ ४३ ॥
कोणी कांही करिती प्रश्न । तात्काळ बोलती जें वचन ।
तेंचि सत्य होय जाण । कालत्रयीं पालटेना ॥ ४४ ॥
आशा धरोनि पुनरावृत्ति । पुन्हां मांडितां प्रश्नोक्ति ।
मनाजोगें बोलोन शांतविती । परि पहिलें तें ढळेना ॥ ४५ ॥
दक्ष तो लक्ष देई । इतरां न कळे कांही ।
आशेनें आंधळें लवलाहीं । करोनि सोडिलें ॥ ४६ ॥
प्रकृति तितुक्या विकृति । अनेक जातींचे जन येती ।
चहाडखोर व्यसनी अतिथी । कर्मठ आणि तामसी ॥ ४७ ॥
अंतरी ओळखुनी अवगुण । तयांसी करिती सावधान ।
न दुखवितां अंतःकरण । बोध करिती ॥ ४८ ॥
जरी कोणाची वस्तु गेली । महाराजां श्रुत झाली ।
सर्वज्ञ म्हणोनि ओळखिली । दुर्बुद्धि कोणाची ॥ ४९ ॥
एकांतीं जावोनि भेट घेती । वस्तु काढोनि आणिती ।
म्हणती सांपडली आम्हांप्रति । मार्गावरी ॥ ५० ॥
दुर्बुद्धी मनीं खोंचले । म्हणती येथें कांही न चले ।
सद्‌गुरुबोधें त्यागिले । दुर्गुण कित्येकीं ॥ ५१ ॥ श्रीगुरुतपस्तेजाखालीं । दुर्गुणांची होळी झाली ।
नरनारी एकत्र नांदलीं । चोर आणि धनिक ॥ ५२ ॥
कित्येकांसी साधनबळें । दुर्गुण त्यजाया लाविले ।
स्वर्गाहून अधिक शोभलें । सद्‌गुरुधाम ॥ ५३ ॥
स्वर्गीं कामक्रोधांच्या राशी । ईषणा मत्सर भूतांसी ।
क्षय होय सुकृतासी । नित्यकाळीं ॥ ५४ ॥
तैसें नव्हे गुरुधाम । सकाम होती निष्काम ।
जोडती सुकृतें अनुपम । देवादिकां दुर्लभ ॥ ५५ ॥
कित्येक ते आपत्काळीं । धांवती सद्‌गुरुपदकमळीं ।
विनविती जीं तापली । दारिद्र्यदुःखें ॥ ५६ ॥
तयांसी साह्य करिती । व्रतबंधां नाहीं मिति ।
विवाह करूनिया देती । गरिबागुरिबांचे ॥ ५७ ॥
नामस्मरण अन्नदान । यांची गणती करील कोण ।
दुष्काळीं करिती अन्नदान । कित्येकांलागून साह्य केलें ॥ ५८ ॥
जेथें नांदे लक्ष्मिपति । तेथें सहजचि लक्ष्मीची वसति ।
दानधर्मासी नाहीं मिति । सद्‌गुरुघरीं ॥ ५९ ॥
चिंतुबुवा कुलगुरूंसी । आणविलें गोंदावलीसी ।
क्षेत्र देऊनि तयांसी । राहविलें तेथेंचि ॥ ६० ॥
घरची शेती वाढविली । विहीर जमीन सोज्ज्वळ केली ।
रामसंस्थानाकडे दिली । नूतनही मोलें घेऊनी ॥ ६१ ॥
रुद्रस्वाहाकार केला । तैसेंचि गायत्री पुरश्चरणाला ।
द्रव्य देवोनि तृप्त केला । अनेक वेळां विप्रगण ॥ ६२ ॥
दुष्काळीं आटपाडीसी । दारिद्र्यें पीडित विप्रांसी ।
बैसविलें नामजपासी । अन्नवस्त्र देउनी ॥ ६३ ॥
अठरा कारखाने चालती । प्रतिवर्षें नूतन इमारती ।
करोनि बहु शोभविती । गोंदावलीसी ॥ ६४ ॥
पहिले मंदिर लहान होतें । यास्तव दुजें बांधिलें तेथें ।
दिवसेंदिवस दाटी होते । ऐसें मनीं आणोनी ॥ ६५ ॥
धर्मशाळा बांधिली मोठी । दत्तमंदिर ज्ञानवापीतटी ।
भजनशाळा बांधली गोमटी । तैसेंचि मंदिर शनीचें ॥ ६६ ॥
भक्तजन उतरायासी । जागा होईना पुरेसी ।
जाणोनि नूतन गृहांसी । बांधविती ॥ ६७ ॥
गोठणीं केली गोशाळा । ओढ्यासी घाट बांधिला ।
दुरुस्त झाली पाकशाळा । पार आणि वृंदावनें ॥ ६८ ॥
भाऊसाहेब केतकर । सद्भक्त चतुर कामगार ।
तयांकरवीं गुरुवर । देखरेख ठेविती ॥ ६९ ॥
उभय मंदिरापाशीं । शिवालयें बांधिलीं खाशीं ।
ऐक्य दाखविलें हरिहरांसी । येणें प्रकारें ॥ ७० ॥
श्रीगुरूंची सेवा करोनि । देह झिजविला जयांनी ।
त्यांची नांवे श्रोतेजनीं । अल्पस्वल्प परिसावीं ॥ ७१ ॥
महाभागवत कुर्तकोटीकर । छत्र धरिती गुरूंवर ।
पादुका वागविती निरंतर । समागमें राहोनी ॥ ७२ ॥
भागवतां निरोप झाला तेव्हां । तदनंतर गोविंदबुवा ।
तैसीच करिती भावें सेवा । मानवां जी दुर्लभ ॥ ७३ ॥
पंतोजी कोल्हापुरकर । गोरक्षणीं दक्ष फार ।
वस्त्रें धुताती सुंदर । वामनराव ज्ञानेश्वरी ॥ ७४ ॥
दाढे जे अंताजीपंत । दामोदर दुजे भक्त ।
श्रीधरभट्ट स्वदेह झिजवित । खजिनदार गुरुघरचे ॥ ७५ ॥
द्रोण पत्रावळी लक्ष्मण । पुरवी एकनिष्ठें करून ।
भवानराव निळकंठबुवा जाण । इंधनासी पुरविती ॥ ७६ ॥
हरभट चिंचणीकर जोशी । प्रेमें भजन करिती हर्षीं ।
मर्ढेकरशास्त्री पुराणासी । नित्य वाचिती मंदिरीं ॥ ७७ ॥
भाऊसाहेब वनाधिकारी । वाईकर रामशास्त्री ।
हेही वाचिती मंदिरीं । धर्मग्रंथ ॥ ७८ ॥
विश्वनाथ अश्व पाळी । मुक्ताबाई पाकशाळीं ।
आणिकही भक्त मंडळी । देह झिजविती गुरुगृहीं ॥ ७९ ॥
ज्यांची भाग्यें उदया येती । तेचि गुरुगृहीं राबती ।
अभागी आम्ही मंदमति । चरणधूळ वंदूं तयांची ॥ ८० ॥
कोणी रांगोळ्या घालिती । गुरुचरण प्रक्षाळिती ।
उष्टावळी कोणी काढिती । दळण दळती गुरुभगिनी ॥ ८१ ॥
दामूबुवा कुरवलीकर । सेवें झिजविलें शरीर ।
सिद्धपणें महीवर । विचरती आतां ॥ ८२ ॥
गुरुगृहीं काढून केर । नाशिला सर्व संसार ।
ऐसे असती अनेक नर । वंदूं तयां साष्टांगे ॥ ८३ ॥
ही गोंदावलीची स्थिति । इतरत्रही बहु असती ।
ग्रंथ वाढेल या भितीं । स्वल्प संकेत दाखविला ॥ ८४ ॥
असो ऐसा संसार । कुटुंबी जन अपार ।
अखंड चाले कारभार । उसंत नाहीं ॥ ८५ ॥
इतुकीही करूनि व्याप्ति । तेथें सदैव नांदे शांती ।
वृत्तिशून्य योगेश्वर असती । अनुभवा येई प्रत्यक्ष ॥ ८६ ॥
ज्ञानी स्वप्नींचे वैभव । खोटें पाहे सावयव ।
असत्य जाणूनि लाघव । सत्यपणें पाहे जैसा ॥ ८७ ॥
नित्य जलामाजीं वसती । परि जलबिंदूही न धरिती ।
कमलपणें जैशा रीती । तैसे वागती गुरुराव ॥ ८८ ॥
अथवा आकाश जगव्यापक । माजीं कार्यें होतीं अनेक ।
चहूंभूतांचे कौतुक । किती म्हणोनि सांगावें ॥ ८९ ॥
सों सों वारा वाही । धुरळा उठवीं ठायीं ठायीं ।
वाटे आकाश भेदोनि जाई । दिव्यलोकीं ॥ ९० ॥
धूमाचे चालिले लोट । विजांचा उठे कडकडाट ।
मेघ फिरती घनदाट । ठायीं ठायीं अंबरीं ॥ ९१ ॥
परि तें कांही मळेना । भिजेना हलेना उडेना ।
व्यापकता शांति सोडेना । जैसें तैसें ॥ ९२ ॥
अखंड व्यपार होती जाती । वरिवरी विकारले दिसती ।
परि डळमळेना शांति । अलिप्त स्वरूपानुसंधानें ॥ ९३ ॥
जनकराजा कलियुगींचा । वाटे सद्‌गुरु आमुचा ।
करोनि व्यापक प्रपंचा । विदेहता नित्य भोगी ॥ ९४ ॥
असो जनसमुदाय वाढला । वेळोवेळीं बोध केला ।
जिहीं भावें हृदयीं धरिला । भोगिती ते जीवन्मुक्ति ॥ ९५ ॥
त्यांतील कांहींसा भाग । त्यांचेचि शब्दें बोलूं मग ।
श्रवणें निवेल तगमग । मनन क्रिया केलिया ॥ ९६ ॥
पुढील अध्यायीं निरूपण । सद्‌गुरुवचनें होईल पूर्ण ।
चित्तीं धरितां अनुसंधान । समाधान पावेल ॥ ९७ ॥
प्रपंच आणि परमार्थ । तरोनि साधेल स्वार्थ ।
सद्‌गुरुवचन सिद्धांत । येईल हाता ॥ ९८ ॥
सप्तमाध्याय महौषधि । सेवितां शमे भवव्याधि ।
स्थिर करोनियां बुद्धि । श्रवण मनन करावें ॥ ९९ ॥
कामधेनू गृहीं आली । पूजनें अर्चनें तोषविली ।
सहज होईल पान्हावली । मनोप्सित पुरवील ॥ १०० ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ १०१ ॥
॥ इति श्रीसद्‌गुगुलीलामृते षष्ठाध्यायांतर्गतः षष्ठः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय सातवा
समास पहिला

जशी माउली ग्रास देते मुलाला । तसें बोधुनी ज्ञान पाजी जनांला ॥
धरेसारखी ज्या वसे नित्य शांति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ७ ॥

जयजयाजी एकदंता । विघ्नहारी सुखदाता ।
वंदूं श्रीशारदामाता । जगज्जननी मति देईं ॥ १ ॥
साधका साह्य हनुमंत । वंदन करूं तया सतत ।
भुभुःकारें दुमदुमवित । लोकत्रय ॥ २ ॥
तेहतीस कोटी देवभाव । एकचि नटला रामराव ।
वंदूं दुजा धरूनि भाव । भक्तिसोहळा भोगावया ॥ ३ ॥
जयजय श्रीगुरुमाय । आम्हां अर्भकाची सोय ।
अपाय छेदूनि उपाय । करीतसे ॥ ४ ॥
आमुचें हित आम्हांसी । ठाऊक नसे निश्चयेंसी ।
परि माय जाणें मानसीं । वेळोवेळां सांवरीतसे ॥ ५ ॥
लोभछंदे क्रीडा करितां । दुःखगर्तीं पडेल आतां ।
जाणोन सद्गुरुमाता । निवारीतसे तेथूनी ॥ ६ ॥
अहंता अज्ञान भरलें । वासनातस्करीं मोहिलें ।
विषयआमिषा दावोनि नेलें । आडमार्गीं जीवासी ॥ ७ ॥
विवेकइंद्रियें तोडिली । सुकृतभूषणें लुबाडिली ।
जन्ममृत्युदरीं लोटिली । अज्ञान बालकें निर्दयीं ॥ ८ ॥
तेव्हां माय आठवली । दीर्घस्वरें करुणा भाकिली ।
तंव ती धांवोनि कुरवाळी । त्रिविध ताप हराया ॥ ९ ॥
माय ममतें कुर्वाळी । सद्गुरु माय निर्दाळी ।
हेतुरहित प्रेमजिव्हाळी । गुरुमायेची ॥ १० ॥
माय एक जन्मींची । गुरुमाय जन्मोजन्मींची ।
सत्ता त्रिभुवनीं जिची । चाले अखंड ॥ ११ ॥
माय संसृतीत गोवी । सद्गुरु करीत गोसावी ।
दुजेपणाची यादवी । उठोंचि नेदी ॥ १२ ॥
ऐसी गुरुमाय धन्य । भक्तिरस पाजवी स्तन्य ।
धरितां आश्रय भिवोन । यमकिंकर न शिवती ॥ १३ ॥
धरितां सद्गुरु कांस । सीमा नाहीं आनंदास ।
बेगुमानी कळिकाळास । मानेना अल्पही ॥ १४ ॥
माय पर गुरु माय । जी दीन अर्भकांची सोय ।
चुकवीतसे जन्ममरणघाय । बोधामृत पाजोनी ॥ १५ ॥
गुरुमायवचनीं विश्वासले । ते कृतकृत्य होवोनि गेले ।
नित्य पाहिजेत वंदिले । चरण तयांचे ॥ १६ ॥
असो ऐसी गुरुमाउली । आम्हां लाभली गोंदावलीं ।
बोधकवळ मुखीं घाली । चमत्कृति दावोनी ॥ १७ ॥
आम्ही अर्भके अज्ञान । बसतों हट्ट धरोन ।
वैभवछंदा दावोन । बोधग्रास घालीतसे ॥ १८ ॥
ऐसे जे वरचेवरी । ग्रास माय मुखीं भरी ।
तेचि बोलूं ये अवसरीं । सात्विक परम ॥ १९ ॥
पादपूरणार्थ कांही । क्वचित येईल नवाई ।
परि जाणा साक्षात् सर्वही । सद्गुरुवचनें ॥ २० ॥
ऐसा हा विवेकसिंधु । गुरुमुखींचा अनुवादु ।
सेवितां तो परमानंदु । अनुभवा येईल ॥ २१ ॥
गुरुवचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे ।
दासबोधीं समर्थें ऐसें । पाहा प्रत्यक्ष कथियेलें ॥ २२ ॥
चित्त दुश्चित न करावें । बोल हृदयीं धरावे ।
म्हणजे संसृतीचे गोवे । तुटोनि जाती ॥ २३ ॥
असो गुरुबोधामृत । कवळकवळी मुखीं घेत ।
बैसावें जी गुरुभक्त । विनंती माझी ॥ २४ ॥
येथें काय निरोपिलें । श्रवणें काय हातीं आलें ।
तें तें संकलित कथिलें । अवधान द्यावें ॥ २५ ॥

गुरुबोधो महामंत्रो ब्रह्मचैतन्यधी ऋषिः ।
देवता रामचंद्रश्च ओवीच्छंदस्तु प्राकृतः ॥ १ ॥
धर्महानिः कलौ बीजं श्रद्धा शक्तिस्तु सात्त्विकी ।
रामनाम जपेन्नित्यं सद्धर्म इति कीलकम् ॥ २ ॥

नरदेहाचे सार । कांही करावा विचार ।
ना तरी श्वानसूकर । पशु जैसे ॥ २६ ॥
स्त्री-पुत्र-देह रक्षण । हें जीवमात्राचें लक्षण ।
असेल भगवंताचें अनुसंधान । तरीच मनुष्य म्हणवावें ॥ २७ ॥
एवं संसृतिजन्य विकार । तितुके दुःखाचे डोंगर ।
त्यांतून जावया पार । साधन नरदेह एकला ॥ २८ ॥
येथें ज्यानें आळस केला । तो पशूंमाजी गणला ।
याकारणें विवेक भला । केला पाहिजे ॥ २९ ॥
येथें जे वाटे सुख । तें परिणामीं देई दुःख ।
याकारणें साधकें विवेक । केलाचि करावा ॥ ३० ॥कलि झाला प्रबळ । विवेकाचें न चाले बळ ।
चित्त झाले विकळ । सुख कोठें दिसेना ॥ ३१ ॥
अतृप्त वासना दुःख । माया उपजवी शोक ।
वासना माया दोष अनेक । करविती स्वसत्तें ॥ ३२ ॥
तेणें चित्त होय आंधळें । विश्रांती कोठें नाढळे ।
समाधान दुरी राहिलें । वृत्ति स्थिर होईना ॥ ३३ ॥
परमार्थाचा नाहीं लेश । मायाभ्रमें कासावीस ।
तेणें गुणें आला त्रास । श्वासोच्छ्वासीं दुःख भोगी ॥ ३४ ॥
इच्छेचा पाहतां व्यापार । विषयावरी प्रेम फार ।
कीर्ति असावी महीवर । अभिमान वाहे मस्तकीं ॥ ३५ ॥
ऐसा संसार दुर्धर । केवळ दुःखाचे डोंगर ।
यांतचि सुख इच्छी नर । जेवीं दीप्तीं पतंग ॥ ३६ ॥
ऐसी दुःखें भोगावयासी । मूळ वासना विवसी ।
अज्ञानें योजी घातासी । बहुतांच्या ॥ ३७ ॥
ती वासना कैसी परी । तुज सांगतों निर्धारी ।
बाळ खेळोन आलें घरीं । वणवा लावोनी वनासी ॥ ३८ ॥
तेथें वृक्ष व्याघ्र जळती । वनचर प्राणी नेणों किती ।
बाळ गृहीं असोन मिति । नाहीं प्राणीवधासी ॥ ३९ ॥
ऐसी वासना वृथा अज्ञान । नसतेंचि उठवी विघ्न ।
अलिप्त जीवा जन्ममरण । अज्ञानें घात करितसे ॥ ४० ॥
आत्म्यास नाहीं जन्ममरण । हें सत्य आहे जाण ।
देहाचेनि दीर्घ स्वप्न । पडलें वासनेचेनि योगें ॥ ४१ ॥
उदकीं उठे बुद्बुदाकार । आत्मत्वीं देहादि विकार ।
उदक बुद्बुद प्रकार । भिन्न नाहीं ॥ ४२ ॥
तैसे देह अनंत दिसती । द्वैतभावें जोजावती ।
परी आत्माराम सर्वांभूतीं । एकला एक ॥ ४३ ॥
वासनायोगें भेद पडला । तेणें सुखदुःखाचा गलबला ।
स्वप्नीं राजपद पावला । पदच्युत झाला क्षणामाजीं ॥ ४४ ॥
सुख वाटलें तेंही मिथ्या । दुःखाचीही तीच वार्ता ।
परि लोभ शोक अहंता । जाच करिती ॥ ४५ ॥
सुखालागीं करी तळमळ । आंत वासना मळमळ ।
देह पद्मपत्रींचे जळ । क्षण एक स्थिरावेना ॥ ४६ ॥
जेथें सुखाचें अधिष्ठान । तें नाथिलें अशाश्वत जाण ।
मृगजळीं शमवावी तहान । म्हणोनि प्राणी धांवतसे ॥ ४७ ॥
येथें कोणी भेटेल ज्ञानी । तरी सांगेल मृगजळ कहाणी ।
तंववरी हा लक्षयोनी । फिरतचि राही ॥ ४८ ॥
असो ऐसी ही वासना । प्रपंचीं गोवित जनां ।
असतीं दुःखें नाना । गणती नाहीं ॥ ४९ ॥
दारिद्र्य लोभ आधिव्याधि । मन अहंकार माया बुद्धि ।
दुष्ट वासना भय शोक उपाधि । कामेषणा पीडीतसे ॥ ५० ॥
संसारी सुख इच्छिणें । इंगळावरी झोंप घेणें ।
दोन्ही सारखीं प्रमाणें । पहावें सूक्ष्मदृष्टीं ॥ ५१ ॥
परि तो संसार सोडवेना । सोडूं जाता सुटेना ।
याकारणें मूळ वासना । नाशिली पाहिजे ॥ ५२ ॥
वासनाक्षय कैसा करावा । संसार कैसा जिंकावा ।
तो मार्ग गुरूसी पुसावा । दीन लीन होवोनी ॥ ५३ ॥
गुरुवाक्य विवरोनि । शरीर झिजवावें साधनीं ।
मुख्य नेम अनुसंधानीं । वासनाबीज भाजावें ॥ ५४ ॥
अखंड करावें नामस्मरण । अलक्ष्यीं लावावें मन ।
भक्तिभावें जगज्जीवन । आपुलासा करावा ॥ ५५ ॥
तरी आधी करावें काय । केव्हां धरावे सद्गुरुपाय ।
जेणें चुकती हे अपाय । तेंही आतां परिसावें ॥ ५६ ॥
स्वधर्म करोनि जतन । कामक्रोधवर्जित मन ।
शांति क्षमा परिपूर्ण । निर्लोभ निर्ममत्व ॥ ५७ ॥
निरामय अंतःकरण । भूतीं दया परिपूर्ण ।
समदृष्टि ठेवोन । गुणदोष न काढावे ॥ ५८ ॥
परपीडा परनिंदा । परद्रव्यापहार कदा ।
परस्त्रीअभिलाषप्रमादा । स्व्प्नींही येऊं न द्यावें ॥ ५९ ॥
पाप भय अनुताप विराग । करोनि अवगुणांचा त्याग ।
आदरें धरावा सत्संग । सद्गतीकारणें ॥ ६० ॥
सद्गुरूसी जावें शरण । चरणीं वहावें तन मन धन ।
स्वस्वरूप घ्यावें ओळखून । समाधानाकारणें ॥ ६१ ॥
तरी सद्गुरु कैसा ओळखवा । काय पदार्थ त्यांना द्यावा ।
कोण अनुभव स्वयें घ्यावा । सद्गुरुपासोनी ॥ ६२ ॥
या प्रश्नाचें निरूपण । पुढील समासीं होईल जाण ।
स्थिर ठेवोनि मन । श्रवण करावें ॥ ६३ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सातवा
समास दुसरा

सद्गुरु बहुत म्हणविती । नाना सोंगे दाविती ।
भोळ्याभाविकां फसविती । गल्लोगल्लीं कित्येक ॥ १ ॥
शब्दज्ञानामाझारीं चतुर । वेदान्त बोलती घरोघर ।
म्हणती उपदेश ग्या माझा थोर । ब्रह्म दावितों तुम्हांसी ॥ २ ॥
सद्गुरुहून देव न श्रेष्ठ । ऐसे सद्गुरु आम्ही वरिष्ठ ।
विपरीत आधार देऊन स्पष्ट । भोळ्यभाबड्यां दगा देती ॥ ३ ॥
कपटबुद्धीनें भोंदुनी । आयाबाया तुच्छ करोनी ।
गरीब सत्पात्र स्वल्पज्ञानी । यांची करिती हेळणा ॥ ४ ॥
सत्ताधीश राजे श्रीमान । यांचे होती रजःकण ।
ऐसें जया विपरीत ज्ञान । त्यास गुरु म्हणों नये ॥ ५ ॥
जे अधर्मकर्में सांगती । मजला द्रव्य द्या म्हणती ।
तयांचा अनुग्रह कल्पांती । घेऊं नये कदा ॥ ६ ॥
द्वेष मत्सर कपट । लोभ तृष्णा वासना खट ।
भक्तीवांचूनि पोंचट । बोधिती त्यांस मानूं नये ॥ ७ ॥
ज्ञान गर्व आणि ताठा । म्हण माझा उपदेश मोठा ।
तरी तो जाण खोटा । कदापिही घेऊं नये ॥ ८ ॥
देहबुद्धि नाहीं गेली । परि ब्रह्मविद्या हातीं आली ।
म्हणती, तयांची साउली । पडों देऊ नये ॥ ८ ॥
अहं ब्रह्मास्मि निर्मळ । आम्हां नाही पापाचा मळ ।
ऐसें बोलती दुर्जन खळ । ती सत्य कलिमुर्ति ॥ १० ॥
आम्ही ब्रह्म ऐसें बोलतां । ब्रह्म न होय सर्वथा ।
सोडून द्यावी देह ममता । तरीच तो ज्ञानसिंधु ॥ ११ ॥
मार्ग चालत असतां कांही । पाहणेंचे कारण नाही ।
सहज नेत्रीं दिसून येई । जेथींचे तेथें ॥ १२ ॥
आम्हा जाणतो ब्रह्म । हाच दुजेपणाचा भ्रम ।
अहंता दिसे परम । देहबुद्धीची ॥ १३ ॥
ऐसे गुरु बहुत असती । यांचेनि नव्हे वानसानिवृत्ति ।
जेथें मिळे अखंड शांति । त्यांची लक्षणणें अवधारा ॥ १४ ॥
सद्गुरुस्वरूपाची ओळखण । त्याचें करील वर्णन ।
ऐसा कोण जगीं निर्माण । मी तों अल्पज्ञ काय बोलूं ॥ १५ ॥
परि थोडें बाह्य लक्षण । त्यचें करूं विवरण ।
जेणें घडेल समाधन । साधकांसी ॥ १६ ॥
दयाशांतीचा पुतळा । जाणे चौदा विद्या चौसष्ट कळा ।
परि आपण वेगळा । प्राकृताऐसा राहोनि ॥ १७ ॥
कामक्रोधा नसे ठाव । नव्हे देहबुद्धीची धांव ।
एक जाणे रामराव । जनप्रियत्व सर्वदा ॥ १८ ॥
जाणोनि निर्गुणाची खूण । सगुण भक्ति परिपूर्ण ।
सदा बोलेन सत्यवचन । पुण्यपावन तपोराशी ॥ १९ ॥
सकळ तीर्थें येवोनि । घालिती स्नान जयालागोनि ।
मी मोठा ऐसा मनीं । न धरी अभिमान ॥ २० ॥
जो भवसागरीं बुडत । तया हात देऊनि काढित ।
शिष्यासी पसरीना हात । कांही द्यावें म्हणोनी ॥ २१ ॥
क्वचित् शिष्य आपुला । दुसर्यासी शरण गेला ।
क्रोध न येई जयाला । तोचि एक सद्गुरु ॥ २२ ॥
जागृति स्वप्न सुषुप्तीसी । तिन्ही अवस्थां एक साक्षी ।
चौदेह वेगळे लक्षी । ऐसा पाहिजे सद्गुरु ॥ २३ ॥
तयासी जावें शरण । तोचि चुकवील जन्ममरण ।
याव्यतिरिक्त असतां लक्षण । शिष्यसमाधान करीना ॥ २४ ॥
कांहीच नसतां ज्ञान । कोरडा धरी अभिमान ।
हाच अधर्म सत्य जाण । तुवां तेथें नवजावें ॥ २५ ॥
गुरुओळख न सांपडे तरी । वरील लक्षणें बाह्यात्कारीं ।
असलीं तरी चरणावरी । मस्तक ठेविजे ॥ २६ ॥
दुजेपणाची मात । विसरोनि जाय तेथ ।
विनवावे सद्गुरु समर्थ । मोक्षेच्छा धरूनी ॥ २७ ॥
बहुत केल्या येरझारा । वासना घेऊं नेदी थारा ।
मी अज्ञान दुबळा दातारा । शरण आलों तुम्हांसी ॥ २८ ॥
मन वैखरी एक करी । अज्ञान दीनत्वातें धरी ।
अहंता सांडोन दुरी । विनवावें श्रीगुरूंसी ॥ २८ ॥
गुरुवचन हाचि स्वार्थ । गुरुवचन हाचि परमार्थ ।
गुरुवचनावीण व्यर्थ । सकल कांही ॥ २९ ॥
घेवोनि अनुग्रहप्रसाद । सेवावें सद्गुरुपद ।
कृपाकटाक्षें जाईल खेद्च । वासना वृत्ती ॥ ३१ ॥
सद्गुरुकृपा व्हावयासी । कारण विश्वास निश्चयेंसी ।
गुरुआज्ञा प्राणासरिसी । मानितां वृत्ति वळतसे ॥ ३२ ॥
शरण जावोनि गुरूसी । साधनीं झिजवा शरीरासी ।
साधनस्थिति आहे कैशी । सांगूं परमार्थी जनहो ॥ ३३ ॥
सुद्ध साधकाची खूण । मी आणि माझेपण ।
मिथ्या आळ हा टाकून । शुद्धज्ञानीं रहावें ॥ ३४ ॥
निरिच्छ सदा असावें । मन जाळून स्वस्थ बसावे ।
आपले स्वरूपीं मिळून जावें । कल्पनातीत ॥ ३५ ॥
वासनाबीज जाळूनि । आत्मज्ञान पाहावें झणीं ।
मग पुनर्जन्मास त्यांनी यावें न लागे।म ॥ ३६ ॥
सामर्थ्यें मिळवूनि सिद्धी । जगीं मिरविती प्रसिद्द्दि ।
उठवोनि जे प्रेतादि । दिवसां मशाली लाविती ॥ ३७ ॥
पुढें कोणी न बोलत ।समस्त राजे पादाक्रांत ।
आत्मस्तुतीं सदा डुल्लत । आनंदित होवोनि ॥ ३८ ॥
परि वासनाबीज न मोडे । आणि सिद्ध म्हणविती गाढे ।
आत्मज्ञानी म्हणती वेडे । तयांलागीं ॥ ३९ ॥
वासनाबीज गेलें मुरोन । ताच ब्रह्मज्ञानाची खूण ।
दुधासी घातलें मुरवण । तया दूध कोण म्हणे ॥ ४० ॥
वृक्ष पाहतां आहे एक । पल्लव दिसती हजारों लाख ।
तैसा विश्वीं विश्वंभर एक । भूतें पाहतां अनंतचि ॥ ४१ ॥
वासना निमालिया पाथीं । आत्मरूप एक दृष्टि ।
ना तरी भूतसृष्टि । विविध प्रकार ॥ ४२ ॥
वासना निमालिया पाहीं । देहीं असतांच विदेही ।
सुखदुःखादि सर्वहि । देहाकरितां ॥ ४३ ॥
धान्य भाजोन काढिलें । परि तें दिसेनासें नाहीं झालें ।
तैसे दृश्य जरी भासले । तरी तें निरुपद्रवी ॥ ४४ ॥
कोणासी न वाटती वांकदे । ऐसे शब्द बोलावे रोकडे ।
साधन करावें गाढें । जनांसीहि रिझवावें ॥ ४५ ॥
वृत्ती असावी कल्पनारहित । सदा रहावें ध्यानस्थ ।
देहभाव त्यजोनि सतत । मन रामीं रंगवावें ॥ ४६ ॥
नम बुद्धि दुराचरी । देहीं गुंतती बहुपरी ।
कैंचा पावेल पैलतीरीं । आत्मज्ञान शब्दमात्रें बोलतां ॥ ४७ ॥ साधनाविणें आत्मज्ञान । अंगी न बाणे म्हणोन ।
वृथा बोलूंच नये जाण । अंतरीं मात्र विवरावें ॥ ४८ ॥
स्वप्नीं बैसला नृपासनीं । जागृतीं भिक्षा दुजे दिनीं ।
कां नाट्यसदनीं राजपत्नी । झालिया काय प्राप्त ॥ ४९ ॥
पाळण्या बाशिंग भांधलें । वरात मिरवोनि घरीं आले ।
तत्क्षणीं तया मूल झालें ऐसी वार्ता न घडेचि ॥ ५० ॥
तदुपरि साधनाविण । बोलूं नये आत्मज्ञान ।
साधनीं असावें परिपूर्ण । परि सिद्ध म्हणवूं नये ॥ ५१ ॥
शंकर करीतसे साधन । जोगी वैराग्यशील जाण ।
ऐसा दुजा आहे कोण । त्रैलोक्य धुंडितां ॥ ५२ ॥
शतकोटीचें काधोनि सार । उमेसह स्मरे शंकर ।
तेथें मानव बापुडे किंकर । पाड काय तयाचा ॥ ५३ ॥
पाकनिष्पत्ति न होतां । क्षुधा न निवारे सर्वथा ।
तेवीं साधनाविणें ज्ञान हातां । येईना निश्चयें ॥ ५४ ॥
स्वस्वरूपीं व्हावें लीन । ऐसें करावें साधन ।
परि वृत्ती सांवरोन । साधन दृढ धर्तावें ॥ ५५ ॥
साधकस्थिति बाणोनि गेली । ज्ञानदशा प्राप्त झाली ।
परि वृत्ति पाहिजे सांभाळिली । वाटमारू जाणोनि ॥ ५६ ॥
जाणावें सर्व वेदसार । सकळ तीर्थांचे माहेर ।
साधकांचे निजघर । परि नेणतेंसें वागावें ॥ ५७ ॥
अर्ध हळकुंडे पिवळे झाले । ऐसे बहुत बुडाले ।
यास्तव साधकें वायचाळे । करूं नये सर्वथा ॥ ५८ ॥
आणिक एक साधकखूण । मुमुक्षु असावें पूर्ण ।
तरीच साधनीं गहन । विस्वास राही ॥ ५९ ॥
मुमुक्षु नसतां चावटी । साधनीं कपाळीं आंठी ।
त्रासेल अपुले पोटी । त्याचें काम नव्हे हें ॥ ६० ॥
कसाबास नाही गाईची दया । जारिणीस नव्हे बालकाची माया ।
तैसें मुमुक्षु नसतां वांया । तो कुतर्की होय बाधक ॥ ६१ ॥
आतां ऐका श्रोतेजन । गुरुपुत्राचें कक्षण ।
कोठें चुकलों असेन मी दीन । तरी मज सावध करावें ॥ ६२ ॥
नव्हे हें माझ्या पदरींचे । जाणा स्वयें गुरुगृहींचे ।
लक्षण कथिलें निर्गुणाचें । खूण समजा गुरुघरची ॥ ६३ ॥
निर्गुणाची जाणून खूण । सगुणाचें करावें ध्यान ।
नित्य नेम जप अनुष्थान । मानसपूजा करावी ॥ ६४ ॥
आधीं करून अध्यात्मश्रवण । विवरविवरों निरूपण ।
तीर्थ व्रत होम दान । साधुब्राह्माणीं आदर ॥ ६५ ॥
प्रेमें करावें भजन पुराण । वेदशास्त्रीं आस्था पूर्ण ।
भूतदया समसमान । शांति अतिगहन असावी ॥ ६६ ॥
लीन असावे प्राणीमात्रासी । मत्सर नसावा मानसीं ।
ऐसें जाणोन राहसी । तरी श्लाघ्यवाणें । ॥ ६७ ॥
रामचिंतन करीत जावें । वैखरी क्षणही न विसंबावे ॥
कामक्रोधाचे प्राण घ्यावे । विवेकें सतत ॥ ६८ ॥
जें वाल्मीकीचें सार । प्रल्हादाचा भाव थोर ।
मारुति जपे निरंतर । शिव ध्यायी सर्वदा ॥ ६९ ॥
पार्वती जी विश्वजननी । नित्यनिम जपे स्मरणी ।
तेंच रामनाम ध्यानीं । आणि मुखींहि असावें ॥ ७० ॥
अओस्जा नेमाच्या हातवटी । प्राणी कधी न होय कष्टी ।
भवबंधन आटाआटी । विरोन होय समाधान ॥ ७१ ॥
अभ्यास लावितां मना । अंतकाळीं दुजी निठे वासना ।
मग जीव भवबंधना- । पासोनि सोडवितसे ॥ ७२ ॥
नित्य नेम दृढ करीं । नेम दृढ झालियावरी ।
देहात्मबुद्धि सत्वरीं । लया जाय ॥ ७३ ॥
ऐसें हें न होय जरी । दुःख भोगावें लागे जन्मवरी ।
यमयातना क्लेश भारी । न चुकेचि निर्धार हा ॥ ७४ ॥
क्लेशें फिरावें देह नाना । चारी खाणीं ध्यानीं आणा ।
यांत संदेह नसे जाणा । दुःख शोक अनिवार ॥ ७५ ॥
हे मागील होतसे उगवण । आतां राखावें सावधपण ।
स्वाधीन करावें आपुलें मन । भलते भ्रांतीं पडूं नये ॥ ७६ ॥
देह जातां कष्ट भारी । जरी मनाचे पडशील भरीं ।
तरी सत्यज्ञान न ये पदरीं । उन्मत्तपणाचेनि गुणें ॥ ७७ ॥
ब्रह्मज्ञान फार कथिण । राघवाचे भक्तीविण, ।
म्हणे मज झाले आत्मज्ञान । तो दैवहीन पापी जाणावा ॥ ७८ ॥
एकवीस सहस्र सहाशें जप । हें असे शिवाचें माप ।
यासीच म्हणती अजपाजप । शिव योगी जपतसे ॥ ७९ ॥
सर्व देवांमाजी शिरोमणि । अयोनिसंभव लावण्यखाणी ।
पूर्णब्रह्म जो निर्गुणी । त्या शिवें सृष्टीकारणें देह धरिला ॥ ८० ॥
ब्रह्मरंध्री कुंडलिनी लाहे । तयानें विषबाधा न जाये ।
जोंवरी सगुण देह आहे । तोंवरी भजन सोडावें ना ॥ ८१ ॥
समाधी लावोन बैसती देख । न तुटती देहाचे कलंक ।
देहसंबंधी विष निःशंक । नामावांचोन शमेना ॥ ८२ ॥
देहस्मरण राहे कुडीं । तोंवरी रामनाम न सोडीं ।
शिव चाखित निगोडी । मानवाचा पाद काय ॥ ८३ ॥
म्हणोन सांगितलें साधन । अंतर्निष्ठेची ही खूण ।
सोडून षड्रिपूंचे बंधन । अखंड चिंतन असावें ॥ ८४ ॥
रामरूप होऊन चिंतन करावें । देहाहून वेगळें वागावे ।
अंतरी जग पाहावें । कसें आहे ॥ ८५ ॥
एका देहाचेचि अवयव । नामकरणीं भिन्न भाव ।
चैतन्य भरलें स्वयमेव । दृश्यीं राहोन जाणिजे ॥ ८६ ॥
आपण एक स्मरण एक । हा जाणावा हीन विवेक ।
चित्त देवोनि थोडे ऐक । आपुलें आपण स्मरण करीं ॥ ८७ ॥
कागद शाई भिन्न असतां । एक करी लेखक मिळतां ।
सुवर्णरज आणि सरी पाहतां । एकचि करणी ॥ ८८ ॥
तैसें अभ्यासावें साधन । मग प्रकृति पुरुष एक जाण ।
निष्काम करूनियां मन । रामरूप पाहावें ॥ ८९ ॥
परेपासोन वैखरीपर्यंत । रामनाम घ्यावें सतत ।
हेच सार साधका सत्य । मुख्यत्वें जाणावें ॥ ९० ॥
वैखरीस रामनाम । न पडावें कधीं खंडण ।
कोठेंही न फिरावें मन । तेंचि अधिष्ठान परेचें ॥ ९१ ॥
वासनाक्षय साधनसार । राम राम दों अक्षर ।
गुरुमुखीं ओळख सत्वर । कृपेंकरोनि घ्यावी ॥ ९२ ॥
आतां याहून आणिक । संशय घेसी तरी देख ।
न दावी आपुलें मुख । आम्हांप्रती ॥ ९३ ॥
ऐसा हा अमृतघुटका । सेवितां दवडील धोका ।
साधकहो नित्य घोका । मननक्रियेसहित ॥ ९४ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सातवा
समास तिसरा

महान् साधु तत्त्वज्ञानी । माता पिता श्रेष्ठ दोनी ।
वंदोनि श्रीचापपाणी । बोलूं श्रीसद्गुरुकृपें ॥ १ ॥
ब्रह्मज्ञान योगियांचे गुज । जें असे त्रिभुवनीं पूज्य ।
तेंचि प्रांजल करूं आज । निजनिर्धारें ॥ २ ॥
मायाब्रह्माचा निवाडा । शुद्ध परमार्थाचा धडा ।
मुख्य अभिमान सोडा । मुमुक्षु जनहो ॥ ३ ॥
अभिमान तो म्हणाल कैसा । मी देही म्हणतो ऐसा ।
या देहाचा नाहीं भरंवसा । उदकीं जैसें प्रतिबिंब ॥ ४ ॥
देही म्हणतां अवघें बंधन । देहातीत आत्मज्ञान ।
ऐसा आधार जाणून । भुलले जन पुन्हां किती ॥ ५ ॥
देहाभिमान विलक्षण । कामक्रोधांचे बंधन ।
म्हणती झाले ब्रह्मज्ञान । हा प्रभाव कलीचा ॥ ६ ॥
क्रियेविण ब्रह्मज्ञान । म्हणे सद्गुरु झाले प्रसन्न ।
हर हर तो जीव जाण । नाडला विपरीतज्ञानें ॥ ७ ॥
अर्थ गहन वेदमथित । ऐसें बोलती पंडित ।
धन्य म्हणविती जगांत । संमत घेवोनि भागवत गीता ॥ ८ ॥
पुस्तक ज्ञानी मिथ्या म्हणों तरी । अवघ्या बुडती नरनारी ।
परि भाविकां नाडिती भारी । शब्दज्ञान पांडित्य ॥ ९ ॥
पुस्तक ज्ञान सत्य कैसें । असत्य म्हणतां लागेल पिसें ।
सत्यासत्य जाणोन विलसे । अनुभवी ज्ञानराशी ॥ १० ॥
चारी अवस्थांबाहेर ब्रह्मज्ञान । उन्मनीपलिकडे जाण ।
तरी हा बोलतो कोण । त्याची शुद्ध तया नाही ॥ ११ ॥
तो जीव होवोनि राही । तेथें ज्ञान नाहीं नाहीं ।
शब्दब्रह्मीं भ्रमला पाहीं । अनुभव तो वेगळा ॥ १२ ॥
चित्राचा वाघ केला । तो काय मारील मेंढ्याला ।
प्रेताचा काय गौरव केला । तरी काय सुख तयासी ॥ १३ ॥
तैसे शब्द लाघव विचार । कैसा तरेल भवसागर ।
दृश्य-द्रष्टा-दर्शन प्रकार । त्यावेगळें स्थान माझे ॥ १४ ॥
अहं सोऽहं याहून आगळा । माझा मी असें भला ।
त्रिगुणरहित असे संचला । निवांतपणें ॥ १५ ॥
ऐसा वदसी सिद्धांत खरा । तूं निर्गुण म्हणतोस पामरा ।
विश्व जगाच थारा । परमात्मा म्हणतोसी ॥ १६॥
त्या परमात्म्याची चिच्छक्ति । नाहीं बा तुज कल्पांतीं ।
देहप्रारब्धगती । चुकणार नाहीं ॥ १७ ॥
ती असेल तैसी घडो । परि आत्मानुसंधान न मोडो ।
व्यर्थ नको बडबडों । अवघड असे तुजला हें ॥ १८ ॥
पहा रे भ्रांती बसली जडोन । कोणी केला तुझा अपमान ।
तेणें तुझें दुखलें मन । होय कीं नव्हे ॥ १९ ॥
एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति । ऐसें कथिती वेद श्रुती ।
तरी मना दुःखितस्थिति । कोठून आली ॥ २० ॥
’मी ब्रह्म’ म्हणविसी । आकाररहित अससी ।
तरी कैसारे उरशी । जगामाजीं ॥ २१ ॥
जगीं भरोन उरला । तोचि म्हणविसी भला ।
ऐसा तुज भ्रम झाला । शास्त्रग्रंथ पढोनिया ॥ २२ ॥
तरी ऐसा पडूं नको भ्रमांत । स्वानुभवें बोलती संत ।
तेचि शब्द मात्र बोलोनि घात । करिसी तूं आपुला ॥ २३ ॥
जगीं म्हणवोनि महंत । बुडविसी जीव अनंत ।
आतां शुद्ध करोन चित्त । आदि अंत पहावा ॥ २४ ॥
परमात्मा निर्गुण निराकार । असोन झाला साकार ।
तैसाच साधूचा प्रकार । करिती सर्वही कर्में ॥ २५ ॥
परि ते कर्में करोनि अलिप्त । तूंही मानिसी तैसेंचि सत्य ।
या अहंकारे होसी उन्मत्त । येणेंचि जीव नरकीं बुडती ॥ २६ ॥
अरे ऐसा अधिकार आला । तो कोणी सांग पाहिला ।
जोंवरी स्वतःसी ज्ञाता मानला । तोंवरी अल्पज्ञान ॥ २७ ॥
चौदेह वाचा चारी । चार वेद अवस्था चारी ।
चार मात्रा पंचतत्त्वेंवरी । पंचविषयी पंचकोश ॥ २८ ॥
पिंड ब्रह्मांड बाह्य सोहळा अघटित । सच्चिदानंद रसभरित ।
उपनिषदांचा मतितार्थ । तें तूं स्वरूप ॥ २९ ॥
ऐसा शब्दे अनुभव येता । तरी सृष्टिक्रम झाला नसता ।
तें गुरुगम्य न ये हातां । ती शब्दातीत ओळखण ॥ ३० ॥
ऐसी परात्पराची खूण । तेथें काय शब्दज्ञान ।
गुरुपुत्र तें जाणून । भ्रांत म्हणती तुजलागीं ॥ ३१ ॥
दरवेशानें मर्कट पाळिला । शब्दज्ञानें तया पढविला ।
घरोघरीं संसार मांडिला । पोटास्तव ॥ ३२ ॥
म्हणे तुझा पति आला । तो लाजून बसे कोंपर्याला ।
सासूची घागर म्हणून दिला । दगड एक मस्तकीं ॥ ३३ ॥
तत्क्षणीं क्रोधें भारी । फेंकून देत दगड दूरी ।
पतीचा म्हणतां सत्वरीं । प्रेमें घेत मस्तकीं ॥ ३४ ॥
काय लाज मर्कटाची । क्रोध येवोन करी ची ची ।
शिकवण दरवेशाची । मर्कट तो केवळ पशु ॥ ३५ ॥
तैसें तुझें गुरूचें ज्ञान । हे दृष्टांतें ये दिसोन ।
पोटासाठीं पराधीन । मर्कट क्रिया करितोसी ॥ ३६ ॥
राघवाचे भक्तीविण । सत्य सत्य हें अज्ञान ।
तुझे गुरुही भ्रमिष्ट जाण । जरी शब्दज्ञान बडबडसी ॥ ३७ ॥ अन्यान गुरु अडक्यास तीन । मिळाले तरी त्यजावे जाण ।
लावणी लाविती ब्रह्मज्ञान । गुरुगम्य तें वेगळें ॥ ३८ ॥
कर्म उपासना तुच्छ मानिती । सत्कर्म कर्तव्य ज्ञान नीति ।
परि जें प्रथमांग वेद बोलती । तें साधकासी अवश्य पाहिजे ॥ ३९ ॥
दुसरें अंग उपासना । तिसरें आत्मज्ञान जाणा ।
ऐशा सत्पुरुषांच्या खुणा । तुज कैशा न मानवती ॥ ४० ॥
तयांसी तूं दूषण दिलें । कर्मौपासनेविण ज्ञान स्थापिलें ।
हें उचित कैसें गमलें । विवरोन पाहा ॥ ४१ ॥
वेदांत म्हणजे क्रियेसहित । आणि पाहिजे अनुभवयुक्त ।
क्रियेवीण जो वेदांत । तोचि घात जीवाचा ॥ ४२ ॥
पुत्र प्रसवली स्त्री कोणी । तो थोर झाला तत्क्षणीं ।
क्षुधा लागली म्हणोनी । अन्न मागे हंडाभरी ॥ ४३ ॥
तो पुत्र नव्हे ऐसे म्हणती । तैसें कर्म उपासना नीति ।
सत्क्रिया वैराग्य विवेकज्योति । अणुभरी नाहीं ॥ ४४ ॥
कामक्रोध असतां । आत्मज्ञान नव्हे सर्वथा ।
भासलें ते मिथ्या । निश्चित जाणावें ॥ ४५ ॥
आत्मज्ञानाचें मुख्य कारण । सगुण पाहिजे सुप्रसन्न ।
म्हणोनिया भावें भजन । केलेंचि पाहिजे ॥ ४६ ॥
सगुण साक्षात् नाहीं झाले । नित्यानित्य नाहीं ओळखिले ।
आणि म्हणती आत्मज्ञान झालें । तरी हें विपरीत ॥ ४७ ॥
वेदशास्त्रबाह्य वर्तन । दुराचरण रात्रंदिन ।
कामक्रोधीं अंतःकरण । गर्व ताठा भरलासे ॥ ४८ ॥
जाणे मानापमान । मना आलें तैसें वर्तन ।
करी सत्याचें खंडण । समाधान नाहीं अंतरी ॥ ४९ ॥
परपीडा निंदा करीत । साधु देव ब्राह्मण संत ।
वेदाशास्त्र पुराणमत । यांचा करी अव्हेर ॥ ५० ॥
तीर्थ व्रत नित्यनेम । सगुणोपासना भजन सुगम ।
जप तप साधन परम । दूषण देती यां सर्वांसी ॥ ५१ ॥
भेदिती दुज्याचें अंतःकरण । भरीं भरोन आपण ।
ऐसे कलियुगींचे जन । त्यांचे वदन न पाहावें ॥ ५२ ॥
त्यांसी दूषणही न द्यावें । त्यांचे शहाणपण न ऐकावें ।
त्यांचे गुण न सेवावे । वाद त्यांसी करूं नये ॥ ५३ ॥
केव्हांच देतील दगा । अभिमान लावितील अंगा ।
उपासना पावेल भंगा । हातोहातीं ॥ ५४ ॥
इतुके प्रकार सांगाया कारण । कली दुर्जन वाढला गहन ।
बहुत पावती पतन । साधनातें सोडोनी ॥ ५५ ॥
वरील बोध घेऊन ध्यानीं । आतां कांही करा करणीं ।
तेणें व्हाल समाधानी । हे सत्य वेदाज्ञा ॥ ५६ ॥
सहज सद्गुरुकृपा वोळे । वेदशास्त्र ज्ञान कळे ।
साधनीं चित्त असतां भलें । सहज होय जीवन्मुक्त ॥ ५७ ॥
प्रथम आवडे परमार्थ । त्यानें हस्तगत होय चित्त ।
तैसेंचि साधन करितां सतत । समाधान प्राप्त होय ॥ ५८ ॥
ज्यासी पाहिजे शुद्धज्ञान । त्याचें सुप्रसन्न असावें मन ।
वेदशास्त्र पुराण श्रवण । रात्रंदिन करावें ॥ ५९ ॥
सतत मनन असावें । मनीं अनुसंधान ठेवावें ।
स्वधर्मरक्षण करावें उपासनीं प्रेम ॥ ६० ॥
दया लीनता आणि शांति । आश्रमधर्म न्याय नीति ।
असोनि मुका निंदास्तुतीं । साधु-ब्राह्मणीं पूर्ण आस्था ॥ ६१ ॥
विश्व अवघे परब्रह्मसमान । आपण व्हावें अणुहून लहान ।
टाकून गर्व दंभ मान । आदर राखावा गुरुवचनीं ॥ ६२ ॥
घेवोनि सद्गुरुवचन । श्रीरामरूप करीं मन ।
अखंड करीं रामचिंतन । सुखदुःख सम मानावें ॥ ६३ ॥
टाकून निद्रा दुर्गुण आळस । गुरुआज्ञे विश्वास ।
विवेक वैराग्य भाग्यास । उणें नसावें ॥ ६४ ॥
प्रपंच व्यापारीं खबरदार । संचित प्रारब्धावरी शरीर ।
प्रवृत्तिमार्ग साचार । आपण वेगळें असावें ॥ ६५ ॥
जोंवरी देहाची संगति । तोंवरी पापें पदरी असती ।
त्यांची व्हावया निवृत्ति । अनुताप पूर्ण पाहिजे ॥ ६६ ॥
तरी तो कोणता अनुताप । जन्मजन्मांतरींचे पाप ।
जीवासी लागलें माप । दारिद्र्य दुःख अपजय ॥ ६७ ॥
आपणा वाटे मी शहाणा । परि लोक निंदिती आपणां ।
जीव बहु श्रमला जाणा । क्लेश भोगी अनिवार ॥ ६८ ॥
पूर्वपापाची संचिति । न चाले उपाय युक्ति ।
कामक्रोधांची संगति । भ्रांति पडे ममत्वें ॥ ६९ ॥
सूक्ष्म अहंकार जाईना । वैभवेच्छा सुटेना ।
वृत्ति आवरितां आवरेना । म्हणोन तळमळ असावी ॥ ७० ॥
संसारगिरि कैसा उल्लंघावा । काय भोग भोगावा ।
काय करूं देवाधिदेवा । ऐसी करुणा भाकावी ॥ ७१ ॥
तैसेंचि गुरूंसी पुसावें । नित्यनेमें अंतर शोधावें ।
सुगुण दुर्गुण पाहावें । कैसे उठती ॥ ७२ ॥
तरूसी लागलें भिरड । कांही दिसां नासेल झाड ।
तैसें विवेकें विवरोनि जाड । दुर्गुणांसी त्यागावे ॥ ७३ ॥
तो विवेक कैसा करावा । साधनीं देह कैसा असावा ।
जेणें तुटेल हा गोवा । पुढील समासीं निरूपण ॥ ७४ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सातवा
समास चवथा

मागां जो प्रश्न झाला । तोचि येथें अनुवादला ।
संसारगिरि उल्लंघिला । जाईल कैसा ॥ १ ॥
सुखें उतरवेल संसार । मातापित्यांसह उद्धार ।
तें तुज सांगेन सार । वेदशास्त्रगुज ॥ २ ॥
योग तपानुष्ठान तीर्थ । धर्म व्रत नेम वेदांत ।
सिद्धांत मथितार्थीं निभ्रांत । आत्मदर्शी होइजे ॥ ३ ॥
गुरुकृपेचें अंजन । सहज होय आत्मज्ञान ।
असत्य मानी तो जाण । गुरुसहित लटिका ॥ ४ ॥
त्याचें न ऐकावें भाषण । मोठें चातुर्य शहाणपण ।
मिथ्या पोंचट शब्दज्ञान । संगति पीडा करील ॥ ५ ॥
हें एक मुख्य लक्षण । आतां सांगतो साधन ।
ब्रह्मकर्माची खूण । तुम्हांप्रति ॥ ६ ॥
संध्या स्नान प्राणायाम । अखंड जपा रामनाम ।
आतां ज्ञानयज्ञ सांगतो सुगम । विवेक अग्नि पेटवावा ॥ ७ ॥
कामक्रोध जाणावे दोनी । निष्काम वृत्ति ठेवोनि ।
नामरूपीं चित्त जडवोनि । असावें सर्वकाळ ॥ ८ ॥
दया शांति करी जतन । अक्रोध सर्वांभूतीं लीन ।
जितेंद्रियत्व श्रवण मनन । जनप्रियत्व असावें ॥ ९ ॥
समसमान सुखदुःख । मान अपमान नसावा देख ।
शत्रुमित्रा मान एक । भगवद्भाव सर्वांठायी ॥ १० ॥
आळस निद्रा आणि तृष्णा । लोभ दंभ आणि वासना ।
यांचे बीज भाजूनि म्हणा । अखंड मुखीं राम राम ॥ ११ ॥
देह ठेवोनि प्रारब्धावरी । उद्योगधंदा सर्व करी ।
परि आपण राहे दूरी । श्रीरामचिंतनीं ॥ १२ ॥
हृदयांत स्मरण श्रीराम । म्हणजे वैखरी जपे नाम ।
ऐसा ज्याचा नित्य नेम । न विसंबे एकही पळ ॥ १३ ॥
विश्वासपूर्वक वचन प्रमाण । तेथें सत्य आत्मज्ञान ।
या व्यतिरिक्त पाखंड जाण । कलीमाजीं उदंड ॥ १४ ॥
जीवन्मुक्ताचें लक्षण । देहदुःखीं नसे मन ।
अखंड ज्याचें समाधान । स्वानंदभरित ॥ १५ ॥
नामरूपीं जडले चित्त । चारी वाचा नाम गर्जत ।
धन्य तो एक जगांत । धन्य कुळ धन्य देश ॥ १६ ॥
सर्व दुःखांचा परिहार । करी नामाचा गजर ।
कामक्रोध आवर आवर । आतां तरी ॥ १७ ॥
नामस्मरणाविण कांहीं । दुजी वार्ता तूं न घेईं ।
अखंड जप वैखरी पाहीं । तेंचि परेचें अधिष्ठान ॥ १८ ॥
तेणें होईल सर्व काम । हातां येईल पुरुषोत्तम ।
तोचि आत्मज्ञानी परम । तोचि खरा गुरुपुत्र ॥ १९ ॥
नामीं रंगलें अंतर । तोचि ब्रह्मज्ञानी नर ।
तेथें कोण वैभव काय थोर । हें एक तो जाणे ॥ २० ॥
तोचि गुरुपुत्र गहन । एरवीं जे पुस्तकज्ञान ।
बहु जल्पती अज्ञान । तेथें अति सावध राहे ॥ २१ ॥
आपलें निजनिष्ठेचें साधन । तेथून न ढळावें मन ।
ही तुज सांगितली खूण । साधकाची ॥ २२ ॥
त्यानेंच पावसी आत्मज्ञान । बहुतेक करिती श्रवण ।
परि निभ्रांत न होती जाण । नामानुसंधानाविरहित ॥ २३ ॥
पक्षी बोले ‘गंगाराम’ । पोपटपंची चतुर परम ।
परि त्याचें तो न जाणे नाम । अजाणबुद्धि म्हणोनी ॥ २४ ॥
तैसा देहाभिमानी गुंतला । तो काय जाणे भगवंताला ।
कपटी ताठा गर्वीं भरला । धन्य म्हणे मी एक ॥ २५ ॥
मज झाले आत्मज्ञान । जग अवघें अज्ञान ।
हा बुद्धिभेद विलक्षण । निर्गुण ठाव न लागे ॥ २६ ॥
सगुणासी देव न मानत । अर्थाचा करी अनर्थ ।
कर्म उपासना म्हणे व्यर्थ । मीच म्हणे झालो देव ॥ २७ ॥
काय पराक्रम केला । वेदशास्त्र धुंडाळोनि आला ।
परि अहंभाव नाही गेला । तो सत्य बद्ध जीव ॥ २८ ॥
कैसा ज्ञानी म्हणतोसी । मी ब्रह्म जाहलो म्हणविसी ।
तरी दीनरूप कां होसी । उत्तर कांही सुचेना ॥ २९ ॥
असो ऐसें मानूं नये । भलते भ्रमीं पडूं नये ।
साधन आपुलें सोडूं नये । महंतीसी फसोनी ॥ ३० ॥
सकल देवांचा जो देव । साक्षात् परमेश्वर गिरिजाधव ।
तोहि स्मरे रामराव । सिद्धपणा न भोगी ॥ ३१ ॥
एवं देह जंव सगुण । तोंवरी न सोडावें साधन ।
जरी आलें सिद्धपण । तरी भजन सोडूं नये ॥ ३२ ॥
मी ज्ञानी ऐसें मानूं नये । ज्ञानी ऐसें सांगूं नये ।
सिद्धपणें वागूं नये । जनांमध्यें ॥ ३३ ॥
येथें एक संशय आला । सिद्ध होवोन मौनी झाला ।
तरी बोध कैसा होईल जनाला । भवसिंधु तराया ॥ ३४ ॥
त्यासी एक प्रमाण । गुरुआज्ञा मुख्य जाण ।
तेणें उद्धरती जन । भवार्णवापासोनी ॥ ३५ ॥
गुरुआज्ञेवांचून कांही । बोध निश्चयें रुजणार नाहीं ।
यास्तव जंव आज्ञा नाहीं । तंव बोध करूं नये ॥ ३६ ॥
स्वयें करितां विवरण । आर्त सहज शिकती जाण ।
यास्तव अधिक उपाधीपासोन । अलिप्त असावें ॥ ३७ ॥
गुरु अंतरसाक्षी ज्ञाना । शिष्याअंगी पात्रता येतां ।
आज्ञा करिती क्षण न लागतां । जगा बोध कराया ॥ ३८ ॥
दुसरें सगुण उपासना । अखंड करितां चालना ।
सहज पावती समाधाना । संगतीं होय फलप्राप्ती ॥ ३९ ॥
आणि या राघवाची भक्ति । वाढवावी यथाशक्ति ।
परि न वाढवावी महंती । सिद्धपणाची ॥ ४० ॥
महंती वाढवितां वाढेना । सहज धांवती जीव नाना ।
कस्तुरीसी शोधिती पहा ना । घोर अरण्यांत ॥ ४१ ॥
निर्जन वनीं मैलागिरी । तो चंदन घरोघरीं ।
तैसे लोक बोधिले जरी । ज्ञानी ऐसें म्हणों नये ॥ ४२ ॥
पुनरपि ज्ञानाचें लक्षण । ऐक गुरुकृपेची खूण ।
दया शांति अति गहन । समदृष्टि असावी ॥ ४३ ॥इंद्रियें जिंकावी समस्त । मन होऊं न द्यावें व्यस्त ।
अक्रोधवृत्ति भाषण सत्य । भूतीं नम्रता असावी ॥ ४४ ॥
व्यवहार असावा युक्त । रजतमोगुणविरहित ।
सगुणोपासना नेमस्त । प्रपंची परमार्थ साधावा ॥ ४५ ॥
अखंड पांचवी अवस्था । सदैव समाधान चित्ता ।
वेळ व्यर्थ न दवडितां । लय साक्षित्व ठेवावें ॥ ४६ ॥
सदोदित रामचिंतन । कामक्रोधीं लोभी मन ।
कधींही नसावे जाण । अहंकार संपूर्ण छेदावा ॥ ४७ ॥
मोहमायेसी दूर करावें । जनप्रियत्वही ठेवावें ।
दुर्बुद्धीसी फिरकों न द्यावें । घरांत शांति असावी ॥ ४८ ॥
बायकामुलें आप्तगोत । सखे सज्जन अभ्यागत ।
यांचे रक्षण नेमस्त । साधन साधोनि करावें ॥ ४९ ॥
विवेकयुक्त अंतःकरण । चित्त प्रसन्न करून ।
निरंतर राम चिंतन । भक्तियुक्त करावें ॥ ५० ॥
आतां ऐका वागणूक । नित्य नेम निःशंक ।
जेणें घडेल सार्थक । नरजन्माचें ॥ ५१ ॥
प्रातःकाळीं प्रातःस्मरण । प्रथम नमावा गजवदन ।
जानकीजीवन उमारमण । सधु सज्जन ऋषिमुनी ॥ ५२ ॥
जनक जननी नद्या सागर । यांसी करूनि नमस्कार ।
शुद्ध करोनि अंतर । मानसपूजा करावी ॥ ५३ ॥
घालोनिया सिद्धासन । श्वासोच्छ्वासीं नामस्मरण ।
अंतरीं ध्यावा सीतारमण । सायुध सालंकार ॥ ५४ ॥
तैसेंचि ध्यावें गुरूसी । पूजा करावी षोडशी ।
साधोनियां एकांतासी । नेत्रोन्मीलन करावें ॥ ५५ ॥
वृत्ति असावी स्वानंदरमणीं । चहूंकडील परतवोनी ।
बळेंचि लावा भगवच्चरणीं । विवेकें सतत ॥ ५६ ॥
विवेक वैराग्य नाम ही त्रिपुटी । असावी सदा गांठी ।
कम क्रोध मोह ही त्रिपुटी । दृष्टीसमोर आणूं नये ॥ ५७ ॥
मान अपमान समसमान । सुखदुःख एक जाण ।
चिंता नसावी तिळप्रमाण । नामस्मरणीं वैखरी ॥ ५८ ॥
बहुत विचारें वागावें । सदा संतोषी रहावें ।
देहा प्रारब्धीं टाकावें । संसारी प्रयत्न करावा ॥ ५९ ॥
वृद्धाचार कुलाचार लौकिक । कधीं सोडूं नये देख ।
शास्त्रविरुद्ध निंदिती लोक । ऐसें वर्तन असूं नये ॥ ६० ॥
अन्यायें धन जोडूं नये । परपीडा करूं नये ।
वादें भरीं भरों नये । भांडूं नये नास्तिकासी ॥ ६१ ॥
मन वृत्ति कोठें राहते । चित्त काय चिंतीत असते ।
हें शोधावें विवेकपंथें । दुर्गुणातें त्यजावया ॥ ६२ ॥
अहंभाव वासना-रहित । वागावया प्रयत्न सतत ।
करावा जाणोनि प्राप्त । कलियुग दुर्बुद्धीचें ॥ ६३ ॥
काळ जन आणि मन । हे ह्या कलीचे स्वाधीन ।
सद्धर्म सत्कर्म अनुष्ठान । करणें बहु कठिण असे ॥ ६४ ॥
कलीचा तो ऐसा नेम । कोणी न भजावा राम ।
योग जप तप होम । सत्क्रिया न करावी ॥ ६५ ॥
म्हणून बहु सावधान । स्वधर्माचें करावें रक्षण ।
युक्त व्यवहार करोनि धन । प्रपंच करा दक्षत्वें ॥ ६६ ॥
करोनियां स्नानसंध्या । श्राधपक्ष प्रपंच धंदा ।
वैखरीसी विसर कदा । नामाचा पडों देवो नये ॥ ६७ ॥
मन चंचल फिरणार । परि वैखरीं नसावा विसर ।
वेद शास्त्र गुरुवर । येथें आदर असावा ॥ ६८ ॥
देव साधु ब्राह्मण । यांचे करावें पूजन ।
आदिकरोनि दुर्जन । भूतीं दया असावी ॥ ६९ ॥
सदा शांत असावें । मन निर्लोभी ठेवावें ।
विषयचिंतन नसावें । सतत करा अभ्यास हा ॥ ७० ॥
कोणास तुच्छ मानूं नये । गर्वें कधीं वागूं नये ।
असत्य भाषण बोलूं नये । ऊर्मि सतत आवरावी ॥ ७१ ॥
प्राणान्त बेतला तरी । स्वप्नीं न चिंतावी परनारी ।
तेणें आकळिला श्रीहरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ७२ ॥
काय देहाचा भरंवसा । कोण दिवस येईल कैसा ।
काळ संगतीसरसा । हें लहन थोर जाणती ॥ ७३ ॥
काम क्रोध गर्व वासना । शोक चिंता वैभव जाणा ।
सुखदुःखादि कल्पना । हेंचि देहाचें देहपण ॥ ७४ ॥
चित्त शुद्ध नाहीं झालें । तरी जन्मा येवोनि काय केलें ।
नाहीं देवा ओळखिलें । स्वधर्म तो कोण जाणे ॥ ७५ ॥
सन्मार्ग तो नाहीं ठावा । संतसंग कोणी करावा ।
आयता सद्गुरु भेटावा । ऐसें म्हणती वाचाळ ॥ ७६ ॥
तरी ऐसें करूं नये । प्रयत्नें संतां शरण जाये ।
नातरी वासना विये । चौर्यांशी लक्ष योनी ॥ ७७ ॥
संतसंगाची लक्षणें । सांगतों तीं परिसणें ।
साधन करा प्रयत्नें । निजहितासी ॥ ७८ ॥
मनोवृत्तीस आवरावें । देहदुःख विसरावें ।
धैर्य बल सांभाळावें । विषयवासना आवरावी ॥ ७९ ॥
छळ कपट शब्दबाण । द्रव्य-दारा-वर्जित मन ।
जाणोन संताची खूण । सर्वत्रीं लीन असावें ॥ ८० ॥
श्रीरामीं प्रेम फार । अभिमान नसे तिळभर ।
सगुणोपासना निरंतर । हर्ष ना विषाद ॥ ८१ ॥
भय चिंता भेदाभेद । नसे लोभ ममता मद ।
उद्विग्न चित्त आणि क्रोध । निंदा न करी कोणाची ॥ ८२ ॥
न सेवी कोणाचें वित्त । न करी कोणाचा घात ।
परदारावर्जित चित्त । आवडी संतसंगाची ॥ ८३ ॥
असत्य न बोले वाणी । जनप्रिय मधुरवचनी ।
दया शांति अंतःकरणीं । परदुःखें दुखे मन ॥ ८४ ॥
परोपकारीं शूर । अंगी वैराग्याचा भर ।
विवेक जागृत बरोबर । तोचि संतकदर जाणे ॥ ८५ ॥
ऐसीं लक्षणें धरावीं । संतसंगगोडी घ्यावी ।
नित्य जीवीं धरावी । सद्गुरुवचनें ॥ ८५ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय सातवा
समास पाचवा

आता ऐका शिकवण । युक्ति बुद्धि शहाणपण ।
जेणें घडे समाधान । प्रपंची आणि परमार्थी ॥ १ ॥
कोणास आशा दाखवूं नये । स्वयेंही कोणाची धरूं नये ।
कोणास उत्तर देऊं नये । हेतु जाणल्यावांचोनी ॥ २ ॥
सुखदुःखाची येतां वेळ । आपलें समाधान न ढळेल ।
ऐशी वृत्ति सखोल । स्थिर राखावी ॥ ३ ॥
साधनासी जी सबब । ती नुकसान स्वयंभ ।
याकारणें साधन दुर्लभ । तेंचि आधीं साधावें ॥ ४ ॥
जपासी बैसल्यावरी । कोणी द्रव्य घालील पदरी ।
अथवा पितामह जरी । आला तरी बोलूं नये ॥ ५ ॥
नाम जपा श्वासोच्छ्वासी । भजा श्रीरामरायासी ।
याचनावृत्तीनें कोणासी । कांहीही मागूं नये ॥ ६ ॥
जो हिशोबी पैशाचा । तोचि दरिद्री साचा ।
जेथें आयात निर्गतीचा । हिशेब नसे तो धन्य ॥ ७ ॥
याकारणें द्रव्यचिंतन । कदा करूं नये जाण ।
आशाळभूत आपुलें मन । कदापि असूं नये ॥ ८ ॥
या मृत्युलोकामाझारीं । रोग नाश शरीरीं ।
होणार हें निर्धारीं । त्याचें दुःख मानूं नये ॥ ९ ॥
देहममता सांडावी । आशा तृष्णा सोडावी ।
रामभक्ति करावी । म्हणजे रामचि होय ॥ १० ॥
ज्यांची जयावरी प्रीति । तेंचि रूप ते होती ।
अंतकाळीं उपजे सन्मति । तोचि अभ्यास करावा ॥ ११ ॥
स्त्रियांचे रूप आणि भाषण । शब्द स्पर्श ममता जाण ।
कधींही प्रिय न मान । जरी परमार्थ तुज व्हावा ॥ १२ ॥
प्रेम क्वचितचि सच असतें । बहुतेक साधकां नाडितें ।
यास्तव वारेंहि अंगावरतें । पडों देऊं नये ॥ १३ ॥
ध्यानीं धरावें पुढील नेम । धरितां होईल आराम ।
तोचि परमार्थ परम । अन्यथा अवघी मळमळ ॥ १४ ॥
अजिंक्य मन जिंकी सदा । परपीडा परनिंदा ।
परदारा परापवादा । परदोषा न पहावें ॥ १५ ॥
सुख दुःख मानापमान । हर्ष विषाद समसमान ।
दंभ गर्व त्यागोन । सत्य शांति धरावी ॥ १६ ॥
अक्रोध जनप्रियता । निर्लोभता विवेक समता ।
भूती दया विरक्तता । लय साक्षिता असावी ॥ १७ ॥
भगवद्भक्ति प्रेमरस । आत्मज्ञानाचा हव्यास ।
स्वानंद स्मरण श्वासोच्छ्वास । चित्त निर्विषय असावें ॥ १८ ॥
दुर्जन छळावया येती । तरी राखें समाधान नीति ।
साह्य होईल श्रीपति । प्रयत्नें निवारितां ॥ १९ ॥
धर्मसंकट महान आलें । तेथें नीतिनें वागले ।
धनाशें अधर्मीं न गुंतले । तेचि धन्य सत्पुरुष ॥ २० ॥
उदरभरण लागे करावें । म्हणोनि उद्योगी असावें ।
परंतु नीतिन्यायें जोडावें । अल्प धन ॥ २१ ॥
परमार्थ निका साधीत जावा । अल्पकाळ धंदा करावा ।
देह सेवेसी न विकावा । धनिका वा नृपासी ॥ २२ ॥
प्रारब्धें घडेल ताबेदारी । तेथें राखा खबरदारी ।
भाकरी दे त्याची चाकरी । कुचराईविण करावी ॥ २३ ॥
जो असे निरपेक्षा । त्यानें वरावी दीक्षा ।
उदरापुरती भिक्षा । मागोन साधनीं रमावें ॥ २४ ॥
आतां सांगूं स्त्रीधर्म । पति हें दैवत परम ।
अंतरीं ध्यावा श्रीराम । शुद्ध भाव ठेवोनी ॥ २५ ॥
जरी पति रागीट तामसी । तरी सोसावें बोलासी ।
अथवा ग्रासला रोगें बहुवसीं । तरी वीट मानूं नये ॥ २६ ॥
पतिसेवा मुख्य साधन । पतिवचन मुख्य प्रमाण।
सदा संतोषी ठेवी मन । सत्कार्यें पतीचें ॥ २७ ॥
पतीवांचोन इतर पुरुष । बाप बंधू मानून त्यांस ।
अखंड नामस्मरणास । जपत रहावें ॥ २८ ॥
काम क्रोध लोभ वर्जून । सदा करा सत्य भाषण ।
पतीनें आज्ञा दिल्याविण । इतर साधन न करावें ॥ २९ ॥
पति असतां दरिद्री । संतोषी असावें घरीं ।
परवैभव परोपरी । वांछोनि न हिणवावें ॥ ३० ॥
पतिआज्ञा पंचप्राण । अंतरीं अखंड नामस्मरण ।
ऐशिया माउलीचे चरण । वंदूं आम्ही ॥ ३१ ॥
आमुची कथा कायसी । देव साधु वंदिती तिसी ।
उद्धरील उभय कुळांसी । पतिव्रता माउली ॥ ३२ ॥
स्त्रियेसी पति दैवत । पतीचा स्त्री डावा हात ।
त्यानेंही निववावें तिचें चित्त । सद्धर्मा अनुलक्षोनी ॥ ३३ ॥
असो पतिव्रत्या जपावे । धैर्य बळें सांभाळावें ।
संकटकाळीं आळवावें । भगवंतासी ॥ ३४ ॥
ऐसा असे स्त्रीधर्म । सद्गुरुवचनामृत सुगम ।
सेवितां हरतील श्रम । जे मायामोहें भासले ॥ ३५ ॥
वडिलांची आज्ञा पाळिती । तीच जाणा गुरुभक्ती ।
येणेंचि घडे सायुज्यमुक्ति । देव साधु मानिती ॥ ३६ ॥
अखंड नामस्मरण करणें । सोपें आहे कठिणपणें ।
चित्त मलिन असे याकारणें । फुकाचें नाम घेववेना ॥ ३७ ॥
अनंतजन्मींची विषयासक्ति । तेणें चित्तें मलिन होती ।
याकारणें बळें वृत्ति । नामस्मरणीं लावावी ॥ ३८ ॥अभ्यासें जरी नाम वाढे । तरीच चित्तशुद्धि घडे ।
संकल्प विकल्प भगदाडें । भरोन येती ॥ ३९ ॥
मन नामीं लागेल गोडी । वासना जाय देशोधडी ।
सद्गुरु होवोनि नावाडी । रामभेटी करील ॥ ४० ॥
नामीं जितुकी गोडी कमी । तितुके दोष अंतर्यामीं ।
चित्त मलिन विषयधामीं । गेलें ऐसें जाणावें ॥ ४१ ॥
मीठ कडू लागेल जरी । तरी ज्वर असे शरीरीं ।
जाणोन उपाय सत्वरीं । करावा लागे ॥ ४२ ॥
अमृताहून नाम गोड । साधु बहु करिती कोड ।
परि आपणा वाटे अवघड । आपुल्या पूर्वपापे जाणावें ॥ ४३ ॥
यास्तव धरोनि नेट । बाळेंचि करी नामपाठ ।
तरीच भवसागर हा अफाट । तरशील तूं ॥ ४४ ॥
या कलियुगाचे राहाटीं । नामावांचोन होसी कष्टी ।
नामें प्राप्त पुढील गोष्टी । अन्य साधनें होती ना ॥ ४५ ॥
साधनीं उपजेल गोडी । गुरुकृपा होईल गाढी ।
विमल ज्ञानाची परवडी । बाणेल सत्य अंतरी ॥ ४६ ॥
शांति भक्ति आणि मुक्ति । प्रपंचीं आणिक परमार्थीं ।
विघ्नें बाधा न करिती । समाधान अक्षय ॥ ४७ ॥
नामें विमल ज्ञानोदय । स्वयंसिद्ध अप्रमेय ।
जें पाठका दुर्लभ होय । नामधारका सुखसाध्य ॥ ४८ ॥
प्रपंच परमार्थ संकटीं । नाम पावे उठाउठी ।
नामावांचोन जगजेठी । धांव न घेईं ॥ ४९ ॥
अहो जे शिष्य सज्जन । करिती गुरुभक्ति नामस्मरण ।
तयां मी सदा सन्निधान । पाठींपोटीं रक्षितसें ॥ ५० ॥
विषयी पोसी जैसा काम । अथवा कृपण रक्षी जैसा दाम ।
तैसा जोडावा श्रीराम । साधकानें ॥ ५१ ॥
त्रैलोक्य व्यापून उरला । दशांगुल परमात्मा भरला ।
तोचि पूजीत जा भला । हृदयमंदिरीं ॥ ५२ ॥
आधीं चित्त शुद्ध व्हावें । तरीच तें ध्यान ठसावें ।
चित्तशुद्धीकारणें घ्यावें । रामनाम अखंड ॥ ५३ ॥
अखंड व्हावया नामस्मरण । मुख्य उपाय सतत प्रयत्न ।
नित्यप्रयत्नें उल्लंघोन । महागिरि मुंगी जाय ॥ ५४ ॥
रुक्मांगदादि स्वयें तरले । तीहीं इतरांही तारिलें ।
खरें पाहतां तेही जन्मले । आम्हांसारिखे मानवचि ॥ ५५ ॥
याकारणें देहबुद्धि । सोडोनि जोडा ज्ञाननिधि ।
देहबुद्धीची उपाधि । मनाहोनि कठिण आहे ॥ ५६ ॥
सर्प मरोन गेला । परि सांगडा असे पडला ।
तया हात लागतां दचकला । प्राणी जैसा ॥ ५७ ॥
प्रेत म्हणजे केवळ माती । परि त्यातेंचि लोक भिती ।
देहवासना धरोनि राहती । कित्येक जीव स्मशानीं ॥ ५८ ॥
देहीं नव्हे जो आसक्त । तोचि एक जीवन्मुक्त ।
देहबंधनें हीं सतत । तोडीत जावीं ॥ ५९ ॥
मरणाची तयारी असावी । वासना कोठें न गुंतावी ।
गुंततां यातना भोगावी । लागेल पुढें ॥ ६० ॥
मुलांनी खेळ मांडिला । बाहुलाबाहुली संसार केला ।
मातेनें संबोधितांचि टाकिला । जेथील तेथें ॥ ६१ ॥
क्षणामाजीं विसरोनि जाई । तैसें उदास सर्वां ठायीं ।
चित्त एक रामापायीं । रामीं ज्योत मिळवावी ॥ ६२ ॥
हें परिसतां सुलभ वाटे । आचरूं जातां हृदय फांटे ।
दक्ष तोचि काढी नेटें । मोहळासारिखें ॥ ६३ ॥
निद्रा आळस चित्त मलिन । अश्रद्धा थोरवी विषयध्यान ।
टाकोन हे पापलक्षण । देहबंधन तोडावें ॥ ६४ ॥
मरोन जातां आपुली गोष्टी । कांही रहावी मागें सृष्टी ।
ऐसे वर्तन जीवनराहाटी । माजीं कांहीं असावें ॥ ६५ ॥
जगाचें हित करूं इच्छिती । सामर्थ्य पाहिजे तयांप्रति ।
म्हणोनि आधीं भगवप्रीति । संपादिली पाहिजे ॥ ६६ ॥
शब्दज्ञान बडबडे । प्रसंग येतां दरडीं दडे ।
तोहि संतां नावडे । शब्दज्ञानी आळशी ॥ ६७ ॥
धरितां कांहीं साधन नीति । सद्गुरु तया तारिती ।
सद्गुरु तारतील म्हणती । आळशी वा वितंडवादी ॥ ६८ ॥
बुडतिया नरासी । दोरी देती धरावयासी ।
न धरी अविवेकी आळशी । तरी दोष कोणाचा ॥ ६९ ॥
येथें दुज्या बोल नाहीं । आपुलीचि करणी सर्व ही ।
यास्तव अभ्यास प्रत्यहीं । केलाचि करावा ॥ ७० ॥
असो ऐसी गुरुमाउली । बोधपान्हा पान्हवली ।
सुवत्सें सेवितां धालीं । कीतीयेक ॥ ७१ ॥
सकलांअध्यायीं मेरुमणि । हा सप्तमाध्याय गुरुवाणी ।
ठेवितां सदा स्मरणीं । भवजाचणी लया जाईल ॥ ७२ ॥
सद्गुरुवचनें हीं सुरस । परि पाद-अर्थपूर्ततेचे दोष ।
घडलिया श्रोतेजेनीं या दीनास । क्षमा करावी ॥ ७३ ॥
पुढील अध्यायीं निरूपण । गुरुकृपें समाधान ।
पावले इह पर कोण । कांहीं विशद होईल ॥ ७४ ॥
कृपामृताचा सागर । सच्छिष्य जलचरें अपार ।
समस्त गणती करणार । ऐसा कवण ॥ ७५ ॥
इति श्रीसद्गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ७६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुगुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः पंचमः समासः ॥
॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय आठवा
समास पहिला

किती प्रार्थिती कामना पूर्ण व्हाया । किती भाविती देहव्याधी हराया ॥
कृपादृष्टीनें त्यांसि आनंद देती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ८ ॥

जयजया सद्‌गुरु क्षीरसगरा । अपरंपारा परात्परा ।
भक्तजनमनोहरा । आनंदरूपा ॥ १ ॥
तुझिय उदरामाजी । अनंत जलचरें असती राजी ।
अनंत भक्त झाले गाजी । पयःपान करोनी ॥ २ ॥
कृपामृताचा भरला पूर । नाकीं तोंडीं गेलें नीर ।
सर्वांगी भरली सार । गुरुभक्ति ॥ ३ ॥
तेणें गेले तळासी । जेथें क्षीरसागरनिवासी ।
लक्ष्मी चरणाची दासी । शेषशय्ये पहुडले ॥ ४ ॥
दर्शनें आनंदित झाले । पुन्हां संसृतीस न आले ।
तुजमाजीं बुडोनि तरले । हें नवल गुरुराया ॥ ५ ॥
सद्‌गुरुसागरा तुमचे पोटी । अनंत रत्नें् असती गोमटीं ।
मोलें वसुंधरा थिटी । तीं भाग्यवंता लाभती ॥ ६ ॥
भक्तिप्रवाल ठायीं ठायीं । वेल पसरले रीघ नाहीं ।
शांती मौक्तिकें शोभती पाहीं । अमोल आणि सतेज ॥ ७ ॥
कीर्तीच्या उसळती लाटा । अनुहतध्वनी गर्जे मोठा ।
मायादरडीसी चपेटा । मारून झिजविती ॥ ८ ॥
साक्षात्कार फेन भरला । तेणें जीवा चटका लागला ।
असंख्य समुदाय लोटला । तुमचे चरणीं ॥ ९ ॥
भोळे भाविक सज्जन । धरिती देवा तुमचे चरण ।
भेटविले सीतारमण । क्षीराब्धिवासी ॥ १० ॥
असो ऐसी गुरुमूर्ति । स्तवितां थकले वेद श्रुति ।
तेथें मानव अल्पमति । वदतां बोल न स्थिरावे ॥ ११ ॥
शब्दब्रह्म हें फोल । व्योमीं भ्रम भासला चंचल ।
तेणें नातुडे निश्चल । निश्चयें गुरुपद ॥ १२ ॥
शब्दलाघव हावभाव । हीं तों चंचल माव ।
अनुभवी घेई अनुभव । तो याहून निराळा ॥ १३ ॥
अज्ञानिया शब्द गहन । तेंचि तया अधिष्ठान ।
तेथेंचि त्याचें समाधान । अकुंचितपणें ॥ १४ ॥
परि तेचि देवें अंगीकारले । तयाकारणें तैसेचि झाले ।
पत्रें पुष्पें फलें आणि जलें । तोषले परमात्मा ॥ १५ ॥
तैसी उपमा श्लाघ्य नोहे । परि आवडी अंतरीं उठताहे ।
तेणें बोलणें घडलें हें । मानूनि घ्यावें ॥ १६ ॥
दीन दासांची माउली । अज्ञान अर्भकांची साउली ।
भक्तकाजार्थ पावली । कलियुगीं मर्त्यलोकीं ॥ १७ ॥
तेथें अनंत शरण आले । कृपाप्रसादा लाधले ।
निजहित साधोनि पावले । समाधान ॥ १८ ॥
तीच येईल पुढती कथा । त्याचा तोचि बोलविता ।
अगाध सिंधु तरोनि जातां । शक्ति कैंची आम्हांसी ॥ १९ ॥
श्रींनीं देशोदेशी प्रवास केला । तेथें तेथें समुदाय वाढला ।
दर्शनें वेध लाविला । परांतरासी ॥ २० ॥
साधु आले ऐसें वदती । बहुत लोक दर्शना जाती ।
दर्शनें आनंदित होती । तपाचेनि तेजें ॥ २१ ॥
नास्तिक खट बाष्कळ । आर्त जिज्ञासू निर्मळ ।
प्रापंचिक कामनेनें विकळ । झाले जे कां ॥ २२ ॥
अथवा त्रिविधतापें जे पोळले । किंवा ज्ञानाचे भुकेले ।
परमार्थ हेत धरूनि आले । ऐसे बहुत ॥ २३ ॥
कित्येक उगाच पाहूं येती । कोणी परोत्कर्षें झोंबती ।
कितीएक कर्मठ निंदिती । नामधारकां ॥ २४ ॥
ऐशा जाती अनेक । कित्येक केवळ भाविक ।
पाहों येती सहेतुक । गुरुराज योगी ॥ २५ ॥
शुद्धाशुद्ध भावना । धरोन येती लोक नाना ।
नाना जीवांच्या कल्पना । किती म्हणोन सांगाव्या ॥ २६ ॥
दृष्टादृष्ट होतां पाही । ऊर्मी मावळती सर्वही ।
भक्तिपाझर फुटे हृदयीं । नम्र होती गुरुचरणी ॥ २७ ॥
जीवाचा जिवलग शिव । तो निर्विकल्प घेई धांव ।
निर्विकल्प गुरुराव । स्वतेजें नमवीतसे ॥ २८ ॥
जनीं जनार्दन ओळखिला । द्वैता ठाव कोठें उरला ।
आपआपणा भेटता झाला । सहजीं सहज आनंद ॥ २९ ॥
अज्ञानी विकल्पी निवाले । अहंकार राउत आडले ।
जेणें जग निर्माण केलें । मिथ्या माया जगडंबर ॥ ३० ॥
तेणें घेतली झुंजणी । झुंजतां गेला पळोनी ।
वायु जैसा गगनीं । विरोन जाय ॥ ३१ ॥
असो संगतीं आले ते तरले । दर्शनें आनंदित झाले ।
ज्ञान शांति साक्षात्कार भले । पाहोनि झालें चकित ॥ ३२ ॥
भूतीं दया आणि सत्ता । राजयोग आणि नम्रता ।
नीति भक्ति विरक्तता । दाक्षिण्यहि सर्वत्र ॥ ३३ ॥
रामनामाचा गजर । उपासना निरंतर ।
स्वधर्मकर्मीं आदर । लीनता पाहोन लीन होती ॥ ३४ ॥
जो साक्षात्‌ हनुमंतअंलश । तया वर्णिता कोण पुरुष ।
बाह्य लक्षणें कांहीं विशेष । अल्पबुद्धीनें कथियेलीं ॥ ३५ ॥
जे जे कोणी शरण आले । ते ते सन्मार्गीं लागले ।
इहपर सौख्य पावले । भावनेसारिखे ॥ ३६ ॥
चौदा सिद्ध झाले असती । ऐसे सद्‌गुरु बोलती ।
आणीक होतील त्यां मिती । कोण करील ॥ ३७ ॥
गुरुवचनीं विश्वास धरिला । तो तो तरोनिया गेला ।
विकल्प आळस ज्यानें केला । तो राहिला ऐलीकडे ॥ ३८ ॥
या भव्य भरतखंडांत । अनंत झाले पदांकित ।
त्यांचा न लागे अंत । कांहीं प्रसिद्ध कथन करूं ॥ ३९ ॥
सकळां करूं नमस्कार । जे सद्‌गुरूंचे किंकर ।
तुमच्या कथा वर्णावया थोर । मति द्यावी दासासी ॥ ४० ॥
समर्थ आणि कल्याण । तैसे श्रीगुरु आणि आनंदसागर जाण ।
यांची कथा विस्तारून । निरोपिजेल आतां ॥ ४१ ॥
मोगलाईमध्यें अंबड तालुका । तेथें पिंपळ गांवीं निका ।
कुळकर्णी अंताजीपंत देखा । गांवकामगार सुशील ॥ ४२ ॥
तयासी झाला एक सुत । गोविंदनामें संबोधित ।
बुद्धि देखोन चकित होत । लहान थोर ॥ ४३ ॥
कांही काळ लोटल्यावरी । अंतोबा गेले इंदुरीं ।
कांही धरोन चाकरी । प्रपंचभार चालविती ॥ ४४ ॥
गोविंदा थोर झाला । तंव शाळेसी घातला ।
तेथें भजन करूं लागला । आणि पोरां शिकवीत ॥ ४५ ॥
म्हणोनि शाळे येवों न देती । इतरां बिघडवील म्हणती ।
यासी सरासरी लिहिण्याप्रती । येऊं लागलें ॥ ४६ ॥
शिवालयीं जावोन बैसावें । आदरें रामनाम घ्यावें ।
दासबोध विवरीत असावें । सर्वकाळ येकांतीं ॥ ४७ ॥
ऐसें क्रमितां समयासी । पंत झाले बैकुंठवासी ।
दशवर्षें गोविंदासी । माय अत्यंत दुखावली ॥ ४८ ॥
कांहीं येईना शेतसारा । भाऊबंदें केला पोबारा ।
क्षत देखून चोंच मारा । म्हणती काक जैसे ॥ ४९ ॥
गृही अत्यंत गरिबी आली । पुंजी सर्व संपोन गेली ।
गोविंदें लिखाई धरिली । निर्वाहाकारणें ॥ ५० ॥
अर्ज चिठ्ठी लिहून द्यावी । कांहीं मजुरी मिळवावी ।
खर्चापुरती गृहीं द्यावी । उरलिया धर्म करी ॥
अंध पंगु भिकारी । यांची येत करुणा भारी ।
तयांलागीं साह्य करी । द्रव्यद्वारां ॥ ५२ ॥
ऐसा गेला कांही काळ । फावल्या वेळीं जपे नाममाळ ।
दासबोध सर्वकाळ । वाची आणि मनन करी ॥ ५३ ॥
अभ्यासें गोडी लागली । अंतरीं उदासीनता आली ।
गुरुभेटीची आर्त लागली । उद्यमीं जाहले दुर्लक्ष ॥ ५४ ॥
सिद्ध साधु बैरागी । आलिया भेटती वेगीं ।
प्रश्न करिती तयांलागीं । अध्यात्मविषयीं ॥ ५५ ॥
जेणें दासबोध विवरिला । तेणें बिकट प्रश्न केला ।
प्रत्युत्तरें भांबावला । दिसे साधु ॥ ५६ ॥
आणिक लक्षणें पाहती । भक्ति उपासना नीति ।
कांहींच नसतां उपहासिती । पोटभरु म्हणोनि ॥ ५७ ॥
जन भुलवायाकारणें । देहाची विटंबना करणें ।
यापेक्षां उदरी कांटे भरणें । फार बरें ॥ ५८ ॥
ऐसे बहुत उपहासिती । अंतरीं गुरुभेटीची आर्ति ।
कोणी भेटेल ज्ञानज्योति । जागोजागीं पाहातसे ॥ ५९ ॥गुरुप्राप्तीलागून । नित्य प्रार्थिती हनुमान ।
सेवा करिती अतिगहन । सद्‌गुरु भेटावा तुम्हांऐसा ॥ ६० ॥
जैसे दिवस गेले । तैसें अंतर तळमळलें ।
वैराग्य शरीरीं खवळलें । धंदा सर्व सोडिला ॥ ६१ ॥
एकदां माय गांवीं जातां । चीजवस्तु वांटिली समस्तां ।
भिक्षाहारें उदरपूर्तता । करूं लागले ॥ ६२ ॥
माय अत्यंत शोक करी । पुत्र आठवली मधुकरी ।
प्ररब्धगति विचित्र सारी । देवा कैसी केली तुवां ॥ ६३ ॥
गोविंदें लोकलाज सांडिली । एकांतवसति आरंभिली ।
चित्ताची मलिनता गेली । देखतदेखतां ॥ ६४ ॥
क्षेत्र नांगरून तयार केलें । वैराग्यजळें तुडुंब भरलें ।
कृषीवल ते शोधीत आले । ज्ञानबीज पेराया ॥ ६५ ॥
एकदा दासबोध वाचीत असतां । महाराज देखिले अवचितां ।
दृष्टादृष्टीं एकतानता । होवोनि गेली ॥ ६६ ॥
देहाची स्मृति उडाली । चिदानंदीं वृत्ति रमली ।
तंव इकडे गुरुमाउली । निघोन गेली ॥ ६७ ॥
एक प्रहरें सावध होती ॥ तंव न दिसे गुरुमूर्ति ।
गल्लोगल्लीं शोधित फिरती । आनंदकंद गुरुलागीं ॥ ६८ ॥
कोणी सांगा समाचार । कोठें गेले गुरुवर ।
नयनीं चालला अश्रुपूर । पुसों लागले सर्वांसी ॥ ६९ ॥
भव्य रूप दिव्य कांती । पायीं खडावा असती ।
कफनी फरगुल घालिती । मस्तकीं टोपी शोभतसे ॥ ७० ॥
कंठीं वैजयंतीमाळा । केशर कस्तुरी त्रिपुंड्र भाळा ।
भोंवती भक्तांचा मेळा । राम राम गर्जतसे ॥ ७१ ॥
कोणी सांगतीं ते समयीं । दिवाण काटापूर गृहीं ।
कोणी साधु असती पाही । शीघ्र जावोन भेटावें ॥ ७२ ॥
धांवत गेले तेथूनी । देखिली नयनीं गुरुजननी ।
देह लोटिला चरणीं । कोण वानी तें सुख ॥ ७३ ॥
उठवोन देती आलिंगन । आनंदसागर ऐसें म्हणोन ।
पोटीं धरिती कुरवाळोन । अनुतापा निवविती ॥ ७४ ॥
तैंपासोन नाम आनंदसागर । वदों लागले नारीनर ।
गोविंदबुवा गुरुवर । ऐसेंहि कोणी म्हणती ॥ ७५ ॥
प्रश्नोत्तरें दिवसरात । होते तेथें आनंदांत ।
परि त्यांची माय होत चिंताग्रस्त । वेड लाविलें बाळासी ॥ ७६ ॥
येवोन निंदों लागली । ’पुत्राच्या जन्माची माती केली ।
मर्कटाहातीं कोलती दिधली । आजिं तुम्हीं’ ॥ ७७ ॥
सद्‌गुरु म्हणती ’अहा माय । तुमचें भाग्य पावलें उदय ।
जन्ममरणादि चुकवील घाय । बेचाळीस कुळांचा ॥ ७८ ॥
ऐसा पुत्र लाधला । आणि म्हणतां वेडा झाला ।
तुम्ही माझे अनुरोधें चाला । तुमचे मनोरथ पुरतील ॥ ७९ ॥
रामसेवा करितां सतत । सर्व पुरतील मनोरथ ।
तुम्ही असावें निश्चिंत । भाग्यें लाधला सुपुत्र’ ॥ ८० ॥
बोध करितां भ्रम गेला । उभयतां अनुग्रह दिला ।
नेम घालोन दिधला । भवसिंधुतारक ॥ ८१ ॥
आनंदसागर करिती सेवा । सेविती स्वानंदाचा मेवा ।
तो प्रकार श्रवण करावा । भाविक जन हो ॥ ८२ ॥
गुरुसेवेहून सार । न मानिती दुजें थोर ।
गुरुआज्ञेवरी विकल्प विचार । अणुभरी धरिती ना ॥ ८३ ॥
स्नान करितां अर्धवस्त्र भिजलें । आणि समर्थें बोलाविलें ।
त्वरित तैसेचि निघाले । ऐसी भक्ती ॥ ८४ ॥
भोजनीं हातीं धरिला घांस । हांक येतां त्या समयास ।
तैसाचि ठेवोनि तयास । धांवत जाती ॥ ८५ ॥
सद्‌गुरु अंतर पाहती । जपानुष्ठाना बैसविती ।
एक दोन दिनराती । अन्नोदकाविण ॥ ८६ ॥
तरी न मानिती खेद । वाटे तो महदानंद ।
आज्ञा झाली हाचि प्रसाद । विशेष मानिती ॥ ८७ ॥
असो सेवेचा ऐसा प्रकार । नित्य झिजविती शरीर ।
जाळिले दुरितांचे डोंगर । गुरुकृपा संपादुनी ॥ ८८ ॥
उन्मनी अवस्था जै आली । पिशाचवत्‌ वृत्ती झाली ।
श्रीगुरूंनीं शांतविली । कृपादृष्टी करोनी ॥ ८९ ॥
ज्ञानोर्मीसी शमविता । गुरुवांचोन नसे त्राता ।
पाठीं पोटीं संरक्षिता । एकलाचि गुरुराणा ॥ ९० ॥
तैसाचि अष्ट महासिद्धी । साधकां घालिती उपाधी ।
शुद्ध भावें दयानिधी । गुरुनाथ तारितसे ॥ ९१ ॥
उभयतां निरोप देती । नर्मदातीरीं बडवाईप्रती ।
जावोन राहावें शीघ्रगती । जप दासबोध चालवावा ॥ ९२ ॥
दहा समास दिधले काढोनी । तैसाचि जप नेमोनी ।
नित्य असावें उपासनीं । ऐंशी हजार दिनसंख्या ॥ ९३ ॥
तंव विरहें दुःखी झाले । परि निरुपायें निघाले ।
बढवाईचे रानीं राहिले । खोपट करोनी ॥ ९४ ॥
ग्रामीं भिक्षा मागोनि । निर्वाह करिती आनंदानें ।
जप दासबोधवाचनीं । क्रमिती काळ ॥ ९५ ॥
दासबोध विवरीत असतां । पक्षी बैसती सभोंवता ।
दाणे टाकिल्याही न खातां । श्रवणीं होती तल्लीन ॥ ९६ ॥
तयासी आधी झाले ज्ञान । रामरूप पाहे भुवन ।
सर्पासी करी वंदन । राम राम म्हणोनि ॥ ९८ ॥
ऐसा काळ चालिला । आनंदीआनंद वाढला ।
दिवस आला आणि गेला । हें न कळे तिघांसीही ॥ ९९ ॥
पुत्राची सिद्धदशा पाहता । माय वंदितसे सुता ।
अनुचित गोष्टी हे तत्त्वतां । वदती आनंदसागर ॥ १०० ॥
तेही करिती नमस्कार । माय धरी त्यांचा कर ।
तूं विश्ववंद्य सिद्ध साचार । मी अज्ञानी मज न नमावें ॥ १०१ ॥
उभयतां वाद पडला । सद्‌गुरूंनी तो मिटवला ।
उभयतांनीं एकमेकाला । नमन कधीं करूं नये ॥ १०२ ॥
उपासना बहु वाढली । सिद्धदशा येऊं लागली ।
तंव इकडे गुरुमाउली । शिष्यभेटीसि निघाली ॥ १०३ ॥
गुरु येती म्हणोन । माळियास झालें ज्ञान ।
उभयतां सामोरे जाऊन । वंदिती गुरुपदा ॥ १०४ ॥
संतुष्ट झाले गुरुवर । ठेविला मस्तकीं वरद कर ।
दवडिले अज्ञान विकार । निजपद तयां दिधलें ॥ १०५ ॥
तयां मुखीं हनुमंतासी । देवविलें अनुग्रहासी ।
हा भक्त योगी ज्ञानराशी । बहुतांसी तारील ॥ १०६ ॥
उभयतांसी अधिकार दिला । मंत्रानुग्रह करावयाला ।
वाढवावें श्रीउपासनेला । रामसेवा करीत जावी ॥ १०७ ॥
आनंदसागरांप्रती । मांदारमुळींचा मारुती ।
देवोनि पारंनरे अंबड प्रांतीं । तयांलागी पाठविलें ॥ १०९ ॥
तेरा कोटी जप केला । अंबड जालना मठ स्थापिला ।
वाढविती उपासनेला । राममंदिरें दोहींकडे ॥ ११० ॥
एकदां गोपाळकाल्यासी । श्रीकृष्ण आले गोपवेषीं ।
दर्शन देवोनि भक्तासी । पुन्हां अदृश्य जाहले ॥ १११ ॥
श्रीगुरु वदती विवाहासी । करीं आतां सत्वरेंसी ।
आनंदसागर वदती मजसी । न लगे प्रपंचबंधन ॥ ११२ ॥
मातेसी पुसती विचार । तीही न दे रुकार ।
गोसावी केला माझा पुत्र । दूषण दिधलें इंदुरीं ॥ ११३ ॥
विनोदें मागील स्मरण देतां । माय विनवी ’श्रीगुरुनाथा ।
अज्ञानें भुरळ होती चित्ता । तव कृपें निवाली’ ॥ ११४ ॥
असो आग्रहें लग्न केलें । सावधासी बंधन कसलें ।
पुत्रकन्यांनी शोभविलें । सच्छिष्य गृहस्थाश्रमी ॥ ११५ ॥
शिष्य शाखा वाढविली । नामगुढी उभारिली ।
बहुतांची यातना सोडविली । अनुग्रहप्रसाद देवोनी ॥ ११६ ॥
कसा उतरल्या वांचोन । अनुग्रह न देती जाण ।
म्हणती विघ्नें येतील दारुण । मम अनुग्रह घेतलिया ॥ ११७ ॥
आनंदपुरीं वसविलें स्थान । नित्य पूजाअर्चा भजन ।
आल्या अतिथा अन्नदान । शरणागता रक्षिती ॥ ११८ ॥
असो सद्‌गुरुप्रसाद । सेवितां झाला आनंद ।
पुढती कथा परिसा विशद । ब्रह्मानंद सिद्धांची ॥ ११९ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय आठवा
समास दुसरा

दुजे शिष्यवर ब्रह्मानंद । दृढ धरिलें गुरुपद ।
सिद्ध होवोनि प्रसिद्ध । जगदुद्धार बहु केला ॥ १ ॥
कर्नाटकीं विजापूर प्रांत । बदामीसन्निध जालिहाळ ग्रामांत ।
विप्रकुटुंब नांदत । स्वधर्मकर्मीं दक्ष सदा ॥ २ ॥
भारद्वाजगोत्री परम । गाडगुळी ऐसें उपनाम ।
बाळंभट्ट द्विजोत्तम । भार्या सती जिऊबाई ॥ ३ ॥
रेणुका उपास्यदैवत । तिचे कृपें चार सुत ।
त्यांमाजीं अनंतभट्ट विख्यात । जाहले श्रीब्रह्मानंद ॥ ४ ॥
बालपणीं हूड भारी । मुलें जमवोनि भजन करी ।
व्रतबंध झालियाउपरी । शास्त्र शिकों घातलें ॥ ५ ॥
मुळगुंद येथील विद्वान । गुरुशास्त्री नामें ब्राह्मण ।
तयाजवळीं राहोन । विद्या बहुत पठण केली ॥ ६ ॥
काव्य तर्क वेदांत । वेदपठणही बहुत ।
शिकोन झाले पंडित । जगन्मान्य ॥ ७ ॥
निरोप आला गृहासी । मायबापें झालीं हर्षी ।
करूं म्हणती विवाहासी । सुशील कन्या पाहोनि ॥ ८ ॥
तंव अनंतें देहभोग । हस्तीं दाविला कुष्ठरोग ।
त्या निमित्तें विवाहयोग । टाळिला साधनीं विक्षेप ॥ ९ ॥
मातापितयांसी विनविलें । देहभोग भोगणें घडलें ।
उपशमन पाहिजे केलें । ईशसेवा करूनी ॥ १० ॥
या निमित्तें आज्ञा घेतली । स्वारी तेथून निघाली ।
सोर्टूर सन्निध पावली । व्यंकटेशासमीप ॥ ११ ॥
भोंवतीं डोंगर उंच गाढे । माजीं व्यंकटवाडी खेडें ।
काळनेमें पडलें उघडें । ओस आणि निर्मनुष्य ॥ १२ ॥
सन्निध ओहोळ आणि कुंड । झाडे गर्द आणि प्रचंड ।
श्वापदें नांदती उदंड । भयानक स्थळ ॥ १३ ॥
कर्नाटकीं व्यंकटेश । दैवत मान्य विशेष ।
तैसें तेथें एक ओस । मंदिर पूर्वींचें ॥ १४ ॥
स्वयंभू व्यंकटेशमूर्ति । नसे कांहीं अवयवाकृति ।
तेथें जावोन राहती । निर्मनुष्य वनामाजी ॥ १५ ॥
भक्तीस एकाग्रता एकांतस्थलीं । वृत्ति साधनीं स्थिर केली ।
सेवा निष्ठेनें चालविली । व्यंकटेशप्रभूची ॥ १६ ॥
उषःकाली स्नान करोनि । अनुष्ठान करिती, मग माध्यान्ही ।
सोर्टूरीं भिक्षा आणोनि । पुष्करणीकुंडीं बुडविती ॥ १७ ॥
व्यंकटेशा नैवेद्य दावोन । एक वेळ करिती भोजन ।
पुनरपि श्रीआराधन । अहोरात्र चालविती ॥ १८ ॥
दिवसांही कोणी संचार न करिती । तेथें केली नित्यवसती ।
वैराग्य उपजलें चित्तीं । देहसार्थक करावें ॥ १९ ॥
विनवीत श्रीव्यंकटेशा । ’भवभयहारका परेशा ।
पुरवावी येवढी आशा । देह सार्थकीं लावावा ॥ २० ॥
बहुत शास्त्रें पठण केली । परि समाधानता नाही आली ।
समधानाची साउली । व्यंकटरमणा दावावी ॥ २१ ॥
करुणा भाकिती वेळोवेळीं । नऊ मास सेवा करी ।
जगन्माय संतोषली । स्वप्नीं येवोनि सांगत ॥ २२ ॥
’आतां अनुष्ठान पुरें करावें । त्वरित उत्तरेसी जावें ।
सद्‌गुरुचरणीं लीन व्हावें । खाणाखुणा सांगितल्या ॥ २३ ॥
अनंत जन्मांची सुकृतें । फळा येतील तेथें ।
कामना व्याधी समस्तें । हरतील सकल गुरुराव’ ॥ २४ ॥
स्वारी तेथून निघाली । उत्तरेप्रति चालिली ।
वाराणसीं वसति केली । कांही कालपर्यंत ॥ २५ ॥
कृष्णानंद स्वामींपाशी । पुन्हां केलें पठणासी ।
गीता उपनिषद्‌भाष्यासी । शारीरभाष्य वेदांत ॥ २६ ॥
विद्वत्ता झाली गहन । तरी नोहे समाधान ।
मनीं ध्यानीं सद्‌गुरुचरण । कोठें भेटतील मजलागीं ॥ २७ ॥
काशी प्रयाग नारायण । अयोध्या मथुरा वृंदावन ।
सकल तीर्थें फिरून । गुरुमाय शोधिती ॥ २८ ॥
फिरत आले इंदुरासी । तेथें देखिलें गुरूंसी ।
दृष्टांती लक्षणें जैसी । तैशीं तेथें पाहिलीं ॥ २९ ॥
तेंचि रूप तेंचि ध्यान । परि न दिसे ज्ञानचिन्ह ।
पोरांसवें खेळत जाण । अज्ञानासारिखे ॥ ३० ॥
नाहीं गीता भाष्य उपनिषद्‌ । पूर्वपक्ष उत्तरपक्ष वाद ।
परमार्थाचा संवाद । तोहि दिसेना ॥ ३१ ॥
प्राकृत भाषा बोलती । नाहीं संस्कृत व्युत्पत्ति ।
मग येथें ज्ञानप्राप्ति । मजसी काय होईल ॥ ३२ ॥
वाराणसीं देखिले साधु । तेथें होत वादविवादु ।
वेदांतचर्चा अनुवादु । पूर्वपक्ष आणि सिद्धांत ॥ ३३ ॥
येथें कांहींच दिसेना । ऐसा विकल्प झाला मना ।
परि वेध लागला तो सुटेना । दर्शनें आनंद होतसे ॥ ३४ ॥
लीला दाविती गुरुराव । येथें शब्दज्ञानवैभव ।
गुंतली वृत्ति अनुभव- । सुखासी नाहीं देखिलें ॥ ३५ ॥
नित्य दर्शनासी येती । सद्‌गुरु बळेंचि वागती ।
बालकांसवें करिती । हास्यविनोद ॥ ३६ ॥
ऐसा काळ बहुत गेला । दर्शनाचा हव्यास लागला ।
परि मनीं विकल्प आला । ज्ञानचिन्ह दिसेना ॥ ३७ ॥
शरण जावें वा न जावें । ऐसे चित्तीं पडले गोवे ।
उगाच पाहत बसावें । सद्‌गुरुलीला ॥ ३८ ॥
भोळे भाविक दर्शना येती । चरणीं लोटांगण घालिती ।
सद्‌गुरु समाधान करिती । ज्याचे त्यापरी ॥ ३९ ॥
देहव्याधि दूर करिती । भूतपिशाचें शरण येती ।
रामनाम प्रस्थापिती । सकळां ठायीं ॥ ४० ॥ पराव्याचें जाणोनि अंतर । नेमकेंचि देती प्रत्युत्तर ।
नित्य घडती चमत्कार । पाहतां विस्मय वाटतसे ॥ ४१ ॥
संगतीसुखा लोलुप झाले । अहंता विकल्प मावळले ।
अनुतापें पोळोनि निघाले । पदीं शरण रिघाया ॥ ४२ ॥
पाहोन चित्तशुद्धि झाली । गुरुमाय पान्हावली ।
ब्रह्मानंदीं मग्न केली । वृत्ति अनंतभट्टाची ॥ ४३ ॥
नाम ठेविलें ब्रह्मानंद । दिधला अनुग्रहप्रसाद ।
सकलांसि झाला आनंद । अनंतशास्त्री शरण आले ॥ ४४ ॥
अंगावरोन हात फिरविती । देहव्याधित्रस्त वदती ।
ब्रह्मानंद तैं विनविती । देहातीत सुख असावें ॥ ४५ ॥
प्रारब्ध भोगोनि सारावें । कर्मबंधापासोन सुटावें ।
तरीच परमार्थ फावे । बंधरहित ॥ ४६ ॥
सद्‌गुरु पुढें आज्ञापिती । जावें नर्मदातीराप्रति ।
ओंकारेश्वर उमापती । स्थान जेथें ॥ ४७ ॥
निर्मनुष्य अरण्यांत । शिवालय जीर्ण बहुत ।
तेथें जावोनि सतत । नामस्मरण करावें ॥ ४८ ॥
ऐशी आज्ञा होतां पाहीं । शीघ्र पावले त्या ठायीं ।
जेथें मनुष्यवसति नाहीं । हिंस्र श्वापदें हिंडती ॥ ४९ ॥
साधोनिया एकांतवास । जप केला सहा मास ।
मग प्रगट झाले गुरु परेश । शिवलिंगामधोनी ॥ ५० ॥
पोटीं धरोनि कुरवाळिलें । अनुष्ठान समाप्त करविलें ।
सवेंचि तेथें गुप्त झाले । गोंदावलीस यावें म्हणोनि ॥ ५१ ॥
गोंदावली येऊनि दर्शन घेती । अति आदरें सेवा करिती ।
कांहीं दिवसांउपरांतीं । आज्ञा करिती गुरुराव ॥ ५२ ॥
’सर्व अधिकार दिधले तुम्हांसी । आतां जावें कर्नाटकासी ।
वाढवावें समर्थपंथासी । राममंदिर स्थापावें ॥ ५३ ॥
वृक्ष न वाढें वृक्षाखालीं’ । ऐसें वदती ते काळीं ।
’जावोनि नामपोई घालीं । हीच सेवा आमुची’ ॥ ५४ ॥
गुरुनिरोपें निघाले । ते कपोतेश्वरीं आले ।
एक तप अनुष्ठान केलें । तेरा कोटी जपाचें ॥ ५५ ॥
बेलधडीस आले तेथोनी । मनीं चिंतिती समर्थवाणी ।
मंदिर बांधावें म्हणोनी । आज्ञा मज झाली असे ॥ ५६ ॥
ऐसी चिंता लागली । तंव समर्थस्वारी आली ।
चरणीं लोटांगण घाली । ब्रह्मानंद शिष्यराणा ॥ ५७ ॥
महाराज वदती ’काय चिंता । रामकृपें सर्व सिद्धता ।
राम भक्ता साह्यकर्ता । यदर्थीं शंका नसावी’ ॥ ५८ ॥
बोधें चित्त शांतविती । मग आले गोंदवलीप्रती ।
इकडे वर्तली चमत्कृती । श्रोतेजनीं परिसावी ॥ ५९ ॥
मंदिर कैसें बांधावें । कैसें द्रव्य मेळवावें ।
गुरुआज्ञे सादर व्हावें । इच्छिती ऐसें ॥ ६० ॥
गांवोगांवी जावोन । बहुत द्रव्य मेळवोन ।
मंदिर बांधिलें शोभायमान । बेलधडीक्षेत्रासी ॥ ६१ ॥
रामस्थापना करायासी । आणिलें श्रीसमर्थांसी ।
तृप्त केले बहुवसीं । अन्नदानें विप्रगण ॥ ६२ ॥
कांहीं दिवसांउपरांतीं । उन्मनी अवस्था धरिती ।
उडाली मुळीं देहस्मृति । बंधन बहुतजन्मींचें ॥ ६३ ॥
कोठेंही पडोनि रहावें । कोणासवें न बोलावें ।
अत्यानंदे डुलत रहावें । अन्नवस्त्रा चाड नाहीं ॥ ६४ ॥
ऐसी ही उन्मनी अवस्था । वेडगळ बाटे समस्तां ।
परि जोडल्या अनंत सुकृतां । जीवा समाधान देतसे ॥ ६५ ॥
असो ऐसे ब्रह्मानंद । सेवोनि श्रीगुरुप्रसाद ।
उन्मन होवोन निजानंद । भोगिती । सिद्धसोहळा ॥ ६६ ॥
पुन्हां लोककार्य करिती । लोकांसारिखे वावरती ।
बीज भाजल्याउपरांतीं । रुजणेचें भय नाहीं ॥ ६७ ॥
तेथून पुढें नरगुंदासी । करविलें रामजपासी ।
तेराकोटी पुरश्चरणासी । विप्रांमुखें ॥ ६८ ॥
सांगतेची केली सिद्धता । परि जलाची नसे पूर्तता ।
अधिकारी वदती भक्तां । उत्सव तेथें न करावा ॥ ६९ ॥
ब्रह्मानंद वदती धीर धरा । रामकृपें सुटतील धारा ।
तंव अकस्मात्‌ मेघ भरारा । येवोनि जल वर्षती ॥ ७० ॥
जलस्थानें भरोन गेलीं । भक्तमंडळी आनंदलीं ।
देव दासांचा वाली । उणें दिसतां धांवतसे ॥ ७१ ॥
जावोनि स्वयें गोंदावलीसी । विनविती श्रीगुरूंसी ।
आलिया जपसांगतेसी । आनंदीआनंद वाढेल ॥ ७२ ॥
जैसा देव भक्तप्राण । तैसे गुरु शिष्याधीन ।
नरगुंदा साधलें निधान । जगदुद्धारक महाराज ॥ ७३ ॥
होम हवन अन्नदान । पुराण भजन निरूपण ।
भूतां पूजोनि भगवान । संतुष्ट केले ब्रह्मानंदें ॥ ७४ ॥
असो ऐसे ब्रह्मानंद । स्वयें पावले सद्‌गुरुपद ।
बहुतांसी अनुग्रहप्रसाद । देवोन सुमार्गा लाविलें ॥ ७५ ॥
पुढें बिदरहळ्ळीसी । गोपाळ कृष्णमंदिरासी ।
केलें जीर्णोद्धारासी । अन्नदान अगणित ॥ ७६ ॥
तेरा कोटी जपसांगता । होम हवनादि पूर्तता ।
आणवोनि सद्‌गुरुनाथा । याचक बहु तोषविले ॥ ७७ ॥
आजन्म ब्रह्मचर्यें राहिले । व्यंकटापूर ठाणें केलें ।
चिरेबंदी मंदिर बांधिलें । भव्य आणि सुंदर ॥ ७८ ॥
श्रीराम आणि हनुमान । तैसे महाराज आणि ब्रह्मानंद जाण ।
गुरुभक्त मानिती तयांलागुन । सद्‌गुरुसारिखे ॥ ७९ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय आठवा
समास तिसरा

आनंदसागर ब्रह्मानंद । यांनी जाणिले ब्रह्मचैतन्य पद ।
आणि शिष्य झाले प्रसिद्ध । तेही पुढती सांगिजेल ॥ १ ॥
कुर्तकोटी । इनामदार । धनवान आणि चतुर ।
लिंगनगौडा नामे द्विजवर । सरस्वती प्रसन्न तयांसी ॥ २ ॥
पाश्चात्य विद्या संपादोनि । संस्कृतीं अग्रगण्यता मिळवूनि ।
विद्याभूषण पदवी जयांनीं । स्वतेजें संपादिली ॥ ३ ॥
आणिकही बहुमान । देशी विदेशी मेळवून ।
नित्य करिती विद्यादान । विद्यार्थियांसी ॥ ४ ॥
सार्वजनिक हितासाठी । नित्य करिती आटाआटी ।
अकस्मात झाली भेटी । ब्रह्मानंदगुरूंची ॥ ५ ॥
पाठक आणि अनुभवी । यांची भेटी झाली बरवी ।
अनुभव सुखाची चवी । वेगळीच आहे ॥ ६ ॥
भक्ति उपासना आणि ज्ञान । पाहोन झालें समाधान ।
नम्र होवोनि तत्क्षण । अनुग्रहप्रसाद घेतला ॥ ७ ॥
तदुपरी ब्रह्मानंद यांनी । विद्या वैराग्य पाहोनि ।
घातले समर्थचरणी । अनुग्रहप्रसाद देवविला ॥ ८ ॥
सद्‌गुरु वदती तयांलागून । करावें भागवतकथन ।
व्युत्पत्ती पाहतां संतोषोन । ‘महाभागवत’ नामे देती ॥ ९ ॥
महाभागवतांचे वैराग्य । पाहतां वाटे धन्य भाग्य ।
भवनदी दुस्तर दुर्लंघ्य । सहज हे उल्लंघिती ॥ १० ॥
सद्‌गुरुसेवा करीती बहुत । रामनाम सदा जपत ।
निरूपणें चित्त शांतवित । सकल जनांचे ॥ ११ ॥
लोकसेवेची हौस भारी । धर्मसुधारणा व्हावी बरी ।
म्हणोन हिंडती नगरोनगरीं । निःस्वार्थ निरालस्यें ॥ १२ ॥
कुर्तकोटीचें शिवमंदिर । तेथेंचि स्थापिले रघुवीर ।
अनुग्रहाचा अधिकार । सद्‌गुरूंनी दिधला असे ॥ १३ ॥
शिष्यशाखा असे थोडी । समाजहिताची बहु गोडी ।
पाश्चात्य पौर्वात्य द्विधा जोडी । उकलोनी दाविती ॥ १४ ॥
स्वधर्मीं सदा रत व्हावें । देशोन्नतीसी झटावें ।
बोध करिती मनोभावें । ठायीं ठायीं ॥ १५ ॥
असो श्रीमहाभागवत । पुढे झाले विख्यात ।
सद्‌गुरुचरणीं झाले रत । आणिक शिष्य ॥ १६ ॥
कर्हा्डक्षेत्री शांताश्रम । संन्यासी कर्मठ परम ।
त्यांचें श्रीगुरूंवरी प्रेम । अतिशयेंसी ॥ १७ ॥
कांही काल वाराणशीसी । होते श्रीगुरूंचे संगतीसी ।
गुरुबंधु उभयतांसी । मानिती एकमेक ॥ १८ ॥
समर्थशिष्य विश्वनाथ । नामें होता भाग्यवंत ।
तयासी समर्थ आज्ञापित । कर्हाहडक्षेत्रीं जावया ॥ १९ ॥
शांताश्रम यतीपाशीं । जावें तुवां वेगेंसी ।
सेवा करावी अहर्निशी । ती आम्हां पावेल ॥ २० ॥
म्हणती प्रसाद घ्यावा । साधनीं देह झिजवावा ।
मम कृपें परलोक साधावा । वदती ऐसें ॥ २१ ॥
यज्ञेश्वर वैदिक विद्वान । श्रीगुरूंसी गेले शरण ।
अनुग्रह मंत्र घेवोन । सेवा केली एकनिष्ठ ॥ २२ ॥
नामपुरश्चरणें केलीं । वेदविद्या गुरूंसी अर्पिली ।
चित्तासी समाधानता आली । साधनबळें ॥ २३ ॥
सद्‌गुरु बहु संतोषले । ‘विश्वनाथ’ नाम ठेविलें ।
सर्व अधिकार तयां दिधले । वाढवा म्हणती भक्तिपंथ ॥ २४ ॥
मठ केला आटपाडीस । स्थापिलें राममंदिरास ।
शिष्यशाखा बहुवस । रामनाम गर्जतसे ॥ २५ ॥
गुरुदक्षिणा विद्येप्रत । दिधली कवण निमित्त ।
तरी परिसावें उदर भरित । होते भिक्षुकी करोनी ॥ २६ ॥
वेदविक्रय कंचकवृत्ती । येणें न घडेल भगवद्भीक्ति ।
यास्तव सद्गुचरुप्रति । अर्पण करोनि सोडिली ॥ २७ ॥
कृष्णा नामें कुच्चीकर । यांचे शिष्य होते चतुर ।
श्रद्धायुक्त नामगजर । करणेंविषयीं प्रसिद्ध ॥ २८ ॥
कुरवली श्रीसिद्धस्थान । तेथील दामोदरबुवा म्हणोन ।
गोसावी हरिदास धरिती चरण । सद्गुारुमहाराजांचे ॥ २९ ॥
अति कठिण सेवा करिती । नीच कामें अंगीकारिती ।
गुरुचरणीं अतिप्रीती । प्रपंचाअस्था टाकिली ॥ ३० ॥
पडेल ते काम करावें । जैसें मिळेल तैसें खावें ।
सदा संतोषी असावें । नाम घ्यावें आदरें ॥ ३१ ॥
दोन तपें संगतीसी । राहिले गुरुसेवेसी ।
सद्गुपरु होवोनि संतोषी । दीक्षा दिधली तयांप्रति ॥ ३२ ॥ अनुग्रहाचा अधिकार । देते झाले गुरुवर ।
गोमेवाडीचें मंदिर । सेवा तेथें सांगितली ॥ ३३ ॥
कांही कालपर्यंत । होतें तेथे सेवा करित ।
पुढें कुरवली जन्मग्रामांत । आज्ञें मंदिर स्थापिलें ॥ ३४ ॥
कुरवलीसी मठ केला । शिष्य समुदाय वाढविला ।
दीनजनांसी दाविला । बोधूनिया सुपंथ ॥ ३५ ॥
भजन अत्यंत प्रेमळ । उच्चस्वर आणि रसाळ ।
परिसतां वाटें मायाजाळ । सोडूनि भजनीं लागावें ॥ ३६ ॥
असो ऐसे दामूबुवा । सन्मागीं लाविती जीवां ।
गुरुप्रसाद वानावा । किती म्हणोनी ॥ ३७ ॥
विष्णुबुवा कुंभोजकर । नामें देशस्थ द्विजवर ।
श्रीगुरूंचे किंकर । झाले कैसे अवधारा ॥ ३८ ॥
सहज गेले दर्शनासी । देखिले श्रीगुरुचरणांसी ।
समाधान झालें मानसीं । पाहोन ज्ञान उपासना ॥ ३९ ॥
भूत भविष्य वर्तमान । जाणोनिही प्राकृतासमान ।
प्रपंच परमार्थ चालवून । समाधानी गुरुमूर्ति ॥ ४० ॥
अनुग्रह घ्यावा ऐसी चित्ती | उदित होय स्वयंस्फूर्ती |
तेंव्हा करिती विनंती | दिना हाती धरावे ॥ ४१ ॥
समर्थ वदती तयांसी । ‘विसरलां मागील गुरूंसी ।
तैसेंच कराल आम्हांसी । तरी कैसें करावें ॥ ४२ ॥
गुरु म्हणजे नव्हे मेवा । लागे देह अर्पावा ।
तरीच त्या देवाधिदेवा । होईल भेटी ॥ ४३ ॥
एक गुरु असतां पाहीं । दुजा वरणे श्लाघ्य नाहीं ।
गुरुक्षोभ घडतां पाही । ठाव कोठेंही न मिळे’ ॥ ४४ ॥
श्रीगुरूंनी बोध केला । तेव्हां मनीं आठव झाला ।
शिवमंत्र असे दिधला । पूर्वीं एका गुरूंनी ॥ ४५ ॥
आणिक सांगितली खूण । तुजसी होईल विस्मरण ।
भेटतां सच्चिदानंद घन । बोध करितील पुनरपि ॥ ४६ ॥
तयांसि सद्गुदरु मानावें । चित्त तेथेंचि अर्पावें ।
जिणें सार्थक करोनि घ्यावें । सद्गु रुसेवा करोनी ॥ ४७ ॥
सर्व वृत्तांत निवेदिला । श्रीगुरूंनीं अनुग्रह केला ।
तोचि मंत्र उपदेशिला । शिवउ्पासना लाविली ॥ ४८ ॥
शिव आणि रघुपति । भेद न मानी कल्पांती ।
आसनीं असतां एकांतीं । शिवमंत्र जपावा ॥ ४९ ॥
येरवीं स्मरावा श्रीराम । जो शिवाचा आराम ।
भक्तकाज कल्पद्रुम । अखंड वदनीं असावा ॥ ५० ॥
असो अनुग्रह घेवोन । बहुत केलें साधन ।
आणि करिती तीर्थाटन । चौधाम सप्तपुर्या॥ ॥ ५१ ॥
द्वादश ज्योतिर्लिंगें केलीं । बहुत वेळां यात्रा झाली ।
पुन्हा तीर्थांची माउली । सद्‌गुरुभेटी पावले ॥ ५२ ॥
स्थिति पाहोन आज्ञा देती । सर्व अधिकार तुम्हांप्रति ।
वाढवी श्रीरामभक्ति । नौका जी भवनदीची ॥ ५३ ॥
गुरुआज्ञा घेवोन । पावले वर्हाीडी सेंदुरजन ।
मठ केला ब्रह्मचैतन्य । शिष्यसमुदाय वाढविला ॥ ५४ ॥
मारुतिराव पिटके म्हणोनि । गृहस्थाश्रमी साधक ज्ञानी ।
दीक्षानुग्रह द्यावयालागोनि । अधिकारी जाहले ॥ ५५ ॥
अंतर्ज्ञानी निःसंदेही । अंगी अहंता मुळींच नाही ।
शिष्य शाखा असे पाही । परि संख्या थोडीशी ॥ ५६ ॥
तम्मणशास्त्री नवलगुंद । यांहीवरी झाला प्रसाद ।
दीक्षा देवोनि ‘सच्चिदानंद’ । नामाभिधान ठेविलें ॥ ५७ ॥
यांचा मठ हुबळीसी । वाढविती रामभक्तीसी ।
शिष्य शाखाही अल्पशी । केली गुरुप्रसादें ॥ ५८ ॥
यावंगली शिवदीक्षित । कर्नाटकीं झाले संत ।
गुरुआज्ञा मानोनि नेमस्त । उपासना चालविती ॥ ५९ ॥
यांचे येथें दत्तस्थापना । स्वयें करी सद्गु रुराणा ।
तेथेंच श्रीजानकीरमणा । प्रतिष्ठा केली आदरें ॥ ६० ॥
उप्पनबेट्टीगिरीकर । कृष्णशास्त्री झाले किंकर ।
साधनीं झिजविती शरीर । शुद्धभाव गुरुचरणीं । ६१ ॥
गुरु शिष्य महासागर । तयांचा न लागे पार ।
अल्पप्रगट वदलें थोर । श्रोतीं रोष न धरावा ॥ ६२ ॥
ऐसे हे संतजन । ज्यांचे अंतरी सीतारमण ।
तयांसी करोनि नमन । पुढील कथा विस्तारूं ॥ ६३ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय आठवा
समास चवथा

नमो अयोध्यावासिया । वसिष्ठ शिष्या रघुराया ।
पित्राज्ञापालका वेदवंद्या । कौसल्यानंदना नमो तुज ॥ १ ॥
गुहकप्रिया श्रीरामा । योगिजनचित्तविरामा ।
वनवासिया निवृत्तकामा । सीतावल्लभ नमो तुज ॥ २ ॥
श्रीगुरु आपले गुण अपार । वर्णितां भागले थोर थोर ।
अवधान द्यावें सत्वर । पुढील कथेसी ॥ ३ ॥
शंकरशास्त्री म्हासुर्णेकर । काव्यव्युत्पन्न भाविक थोर ।
श्रीगुरुंचे झाले किंकर । कवि आणि साधक ॥ ४ ॥
दीक्षा अनुग्रह करावया । सद्‌गुरु अधिकार देती तयां ।
म्हासुर्णे गांवी रामराया- । पाशीं मठ तयांचा ॥ ५ ॥
शिष्य शाखा असे थोडी । कवित्वाची बहु गोडी ।
पुराणसेवेची आवडी । सद्‌गुरुंचे गुण गाती ॥ ६ ॥
कागवाडक्षेत्रीं रामदासी । लागले श्रीगुरुपदासी ।
साडेतीन कोटि जपासी । केलें असे भक्तीनें ॥ ७ ॥
श्रीगुरूंनी दिधली दीक्षा । प्रपंच परमार्थ उभय पक्षां ।
चालवोनि करिती रक्षा । अनंत दुरितांची ॥ ८ ॥
जन्मभूमीचा उद्धार । केला बांधोनि मंदिर ।
अनुग्रहा अधिकार । श्रीगुरूंनी दिधला असे ॥ ९ ॥
शिष्यशाखा असे थोडी । अध्यात्मज्ञानाची गोडी ।
अन्नदानाची परवडी । चालविती बहु ॥ १० ॥
सद्‌गुरूंसी अति भक्ति । वरचेवरी दर्शना जाती ।
प्रपंचीं नसे आसक्ति । रामसेवेची आवडी ॥ ११ ॥
आणिक शिष्य हरिदास । हरिभाऊ वदती जयांस ।
प्रपंचीं सदा उदास । गुरुसेवा अतिप्रिय ॥ १२ ॥
जेव्हां सद्‌गुरुभेटी झाली । तेव्हां पराधीनता सोडिली ।
सदा ध्याती गुरुमाउली । अनन्यभक्तीनें ॥ १३ ॥
सांगली क्षेत्र वसतीस्थान । करिती कीर्तन प्रेमळ भजन ।
नसे तालसूर बंधन । कारण एक उपासना ॥ १४ ॥
कार्यकारण कुटुंब गेह । सद्‌गुरुकार्यीं झिजविती देह ।
न जाणती अन्य उपाय । रामनाम गुरुसेवा ॥ १५ ॥
पुत्र कलत्र बंधु भगिनी । वाहिलीं समग्र सद्‌गुरुचरणीं ।
सकलही गुरुसेवा करोनी । आनंदें काल क्रमिताती ॥ १६ ॥
यांची भगिनी बहिणाबाई । गुरुचरणीं ठेवितां डोई ।
सेवा करितां आळस नाहीं । तिज मायबाप महाराज ॥ १७ ॥
असो कुटुंबी सकळ लोक । हरिदास नामाचें सार्थक ।
करोनी भोगिती सुख । दुर्मिळ गुरुसेवेचें ॥ १८ ॥
रामभट्टाआत्मज बाळंभट्ट जोशी । कुरोलीचे रहिवासी ।
व्यसनी होते अतिशयेंसी । गुरुजवळी सहज आले ॥ १९ ॥
गांजा अफू आणि चरस । सेविती रात्रंदिवस ।
विनविती श्रीसमर्थांस । ‘गोष्टी आमुची परिसावी ॥ २० ॥
जरी पुरवाल आमुचें व्यसन । तरी करूं नामस्मरण ।
आज्ञा मानूं प्राणासमान । असत्य न बोलूं कदापि’ ॥ २१ ॥
सद्‌गुरु वदती ‘उत्तम, । अगत्य चालवूं नेम ।
ऐसे आवडती आम्हां परम । स्पष्टवक्ते’ ॥ २२ ॥
नित्यनेम जप नेमून दिला । ऐसा कांहीं काळ गेला ।
कृपेनें निर्व्यसनी केला । व्यसनासक्त तो द्विज ॥ २३ ॥
साधकस्थिति प्राप्त झाली । चित्तासी शुद्धता आली ।
सद्‌गुरूंनी दीक्षा दिधली । पावन केलें बाळंभट्ट ॥ २४ ॥
ब्रह्मचारी चिमणगांवकर । वैराग्यशील साधक थोर ।
दीक्षानुग्रहाचा अधिकार । श्रीकृपेने लाधला ॥ २६ ॥
हनुमानगढीस राहून । तुळसीकृत रामायण ।
नित्य करिती पारायण । योग्याभ्यासी ज्ञानी तसे ॥ २७ ॥
बलवंतराव घाणेकर । सात्त्विक भाविक साधक थोर ।
श्रींचे झाले किंकर । तनमनधनानें ॥ २८ ॥
बापूसाहेब न्यायाधीश । साठये उपनाम जयांस ।
श्रीगुरूंचे प्रसादास । अधिकारी जाहले ॥ २९ ॥
भाऊसाहेब केतकर । नेमणुकीचे कामगार ।
गुरुचरणीं टाकिला भार । सकलही प्रपंचाचा ॥ ३० ॥
शालिग्राम पंतोजी विद्वान । गिजरेशास्त्री कर्मठ जाण ।
काशीकर गुरुजी वेदसंपन्न । गुरुचरणीं नत होती ॥ ३१ ॥
आप्पासाहेब भडगांवकर । आप्पासाहेब कागवाडकर ।
भय्यासाहेब हर्देकर । धनसंपन्न शिष्य झाले ॥ ३२ ॥
भैय्यासाहेब इंदुरवासी । अखंड जपती रामनामासी ।
गाडगुळी भीमराव गदगनिवासी । सदा ध्याती गुरुपद ॥ ३३ ॥
सांगली क्षेत्रींचे फडणवीस । बळवंतराव वदती जयांस ।
ब्रह्मानंद देती अधिकारास । आपुले गुरुसंस्थेचे ॥ ३४ ॥
तोफखाने जाहले महंत । जयांसी सीताराम वदत ।
गृहीं बांधोनि मंदिराप्रत । रामसेवेसी सादर ॥ ३५ ॥
फडके काकासाहेब वदती । सद्‌गुरु बहु प्रेम करिती ।
वारंवार संरक्षिती । अर्थबोध देवोनी ॥ ३६ ॥गोदूताई नामें भक्त । परम भाविक सत्त्वस्थ ।
विनोदें ‘अंबेहळद’ वदत । सद्‌गुरु तियेप्रती ॥ ३७ ॥
चार वर्षांची असतां । आसनें करविती दावून सत्ता ।
किती वानूं अभिनवता । गुरुकृपेची ॥ ३८ ॥
मुलाचे व्रतबंधनाचे वेळीं । यावी श्रीगुरुमाउली ।
ऐसी आशा बहु धरिली । परि महाराज अति दूर ॥ ३९ ॥
भक्तकाजकल्पद्रुम । सद्‌गुरुमाय विश्राम ।
संकटकालीं होती उगम । भक्तांसी सदा सन्निध ॥ ४९ ॥
व्रतबंधन होवोनि गेलें । विप्र भोजनासी जमले ।
परि तूप वेळेसी न आलें । म्हणून अडलें भोजन ॥ ४१ ॥
अंबेहळद चिंताग्रस्त । श्रीगुरूंसी प्रार्थित ।
तंव ते प्रत्यक्ष प्रकटोन वदत । ‘असेल तेवढें तूप आणा’ ॥ ४२ ॥
पावशेर तूप सकळांसी । वाढिते झाले तपोराशी ।
आनंद झाला सकळांसी । चमत्कृति देखोनी ॥ ४३ ॥
एकदां मंदिरीं ऐसें झालें । नाथभागवत निरूपण चालिलें ।
श्रोतेजन तटस्थ जाहले । गुरुवाक्यें परिसतां ॥ ४४ ॥
तंव अंबेहळदीचा सुत । दत्तू क्रीडे आनंदांत ।
सद्‌गुरु वदती तयाप्रत । दंगा येथें न करावा ॥ ४५ ॥
परि मूल हूड भारी । उगा न राहे क्षणभरी ।
मग श्रींनीं मस्तकावरी । वरदहस्त ठेविला ॥ ४६ ॥
मुलाची लागली समाधि । स्वस्वरूपीं शांत आनंदी ।
एक दिवस गेला मधीं । माय विनवी गुरूंसी ॥ ४७ ॥
बालका लागली असेल भूक । बैसोनि अंग देखेल निःशंक ।
कृपा करोनि घालावी भीक । पुत्र स्मृतीसी आणावा ॥ ४८ ॥
सद्‌गुरु वदती हास्यवदन । निजरंगी रंगलें मन ।
रक्षणकर्ता भगवान । समाधिसमयीं ॥ ४९ ॥
असो पुनरपि मस्तकावरी । हस्त ठेवितांचि सत्वरी ।
बाळ येवोनि देहावरी । गुरुचरण वंदितसे ॥ ५० ॥
ऐसे भक्त बहुत झाले । बहुतां साक्षात्कार घडले ।
सकलांनीं साधन केलें । यथाशक्ति ॥ ५१ ॥
हर्देकरीण दुर्गाबाई । काशीबाई गंगूताई ।
‘पटाईत मावशी’ भक्त पाही । कवि आणि साधक ॥ ५२ ॥
गिरवीकर नरसोपंत । दासबोध वाचिती भक्तियुक्त ।
नाम येवोनि श्रवण करित । डोलतसे आनंदें ॥ ५३ ॥
जेव्हां मनीं विकल्प आला । तेव्हां येईनासा झाला ।
गुरु वदती तयांला । गुरुवाक्य प्रमाण माना ॥ ५४ ॥
मुक्ताबाई शिष्या भली । सद्‌गुरुसेवेसी लागली ।
सकल इंद्रियें झिजविली । गुरुगृहीं राहोनी ॥ ५५ ॥
पाहतां तंव रोडकी दिसे । परि गुरुसेवे उणी नसे ।
पाकशाळेमाजी भासे । प्रत्यक्ष अन्नपूर्णा ॥ ५६ ॥
नामयाची जनाबाई । तैसी गुरूंची मुक्ताबाई ।
सेवेवांचूनि काज नाहीं । वदनीं घेत हरिनाम ॥ ५७ ॥
मुखीं नाम हातीं काम । हाचि एक नित्यनेम ।
सद्‌गुरुचरणीं पावली विश्राम । धन्य भाग्य तियेचें ॥ ५८ ॥
अम्मा नामें मद्रासी । राहिली गुरुसेवेसी ।
द्वादश वर्षें व्रतासी । धरिलें मौन गुरुआज्ञें ॥ ५९ ॥
गृहासक्ति सांडोनी । दुर्लंघ्य वासना जिणोनी ।
आदसें सेवा करोनी । नाम घेत भक्तीने ॥ ६० ॥
वस्त्रें भूषणें कुशलता । गुंफोनि देत भगवंता ।
गृहाची सोडिली आस्था । स्त्रीजात असोनी ॥ ६१ ॥
गोविंदराव अळतेकर । गुरुसेवे झिजविती शरीर ।
मौनव्रत साचार । गुरुआज्ञेनें धरियेलें ॥ ६२ ॥
असो ऐसा बोधवृक्ष । शाखा पसरल्या अनेक ।
जाणते एक गुरुनायक । दुजा समर्थ दिसेना ॥ ६३ ॥
कित्येकांच्या पुरविती कामना । साह्य करिती क्षणक्षणा ।
भक्तियुक्त उपासना । लावोनि देती आनंद ॥ ६४ ॥
कित्येक येती आणि जाती । व्याधीग्रस्त मुक्त होती ।
तयांची न करवे गणती । मशका दुर्लंघ्य मेरू जैसा ॥ ६५ ॥
सकळांसी लाविती साधन । मुख्य एक नामस्मरण ।
क्वचित्‌ औषधीही कथन । करोनि करिती निर्दुःख । ६६ ॥
अंगार्यालची महती फार । लावितांचि जाति विकार ।
जवळीं ठेवितां निशाचर । पीडा न होय निश्चये ६७ ॥
ताईत चिठी दोरा देती । निरोगी करूनि शांतविती ।
मुख्य नाम वनस्पति । पेरित हृदयकाननीं ॥ ६८ ॥
देहादिक विविधताप । वासनाजन्य द्वंद्वताप ।
सकलां रामनामजप । दिव्यौषधि गुरुघरची ॥ ६९ ॥
सिद्ध साधक मुमुक्षु । गुरुगृहीं अनंत भिक्षु ।
जाणता समर्थ ज्ञानचक्षु । स्वल्प संकेत दाविला ॥ ७० ॥
सकलांसी माझा नमस्कार । वारंवार जोडून कर ।
हेंचि गुरूंचे नांदतें घर । ध्यानें अंतरीं कोंदले ॥ ७१ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाटाक्षें ॥ ७२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥
॥ इति अष्टमोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय नववा
समास पहिला

जयें गोधना संकटी रक्षियेले । किती जीव अन्नोदकें तृप्त केले ।
बहू मंदिरें स्थापिली धन्य कीर्ति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ९ ॥

जयजय सद्‌गुरु तरुवरा । संतप्त पांथिकां आसरा ।
कल्पतरूहूनि साजिरा । निर्विकल्प ॥ १ ॥
कल्पतरू काय देतो । कल्पिली वस्तु पुरवितो ।
कल्पनातीत जीव होतो । गुरुछायेसी ॥ २ ॥
संसारपथ महाघोर । त्रिविधतापें पोळें शरीर ।
भेटतां मागीं गुरुवर । कृपाविस्तार साउली ॥ ३ ॥
तरीच शीण अवघा जाये । ना तरी किरणें घेतील धांवे ।
याकारणें संत तुझिये । आश्रयें सुख भोगिती ॥ ४ ॥
शांति सुगंध सुमनांचा । मेवा भ्रमर संतांचा ।
ताप निवाला जन्मांतरींचा । तेथेंच गुंग जाहले ॥ ५ ॥
बोधसुमनें जमविलीं । आत्मारामासी वाहिलीं ।
फलाशेची वाट मोडिली । संतजनांनी ॥ ६ ॥
वृक्षविस्तार बहु मोठा । माजीं अनंत जीवांच्या पेठा ।
छायेसी न पडे तोटा । आकार कोणा न गणवे ॥ ७ ॥
कीर्तिमोहोर विस्तारला । चैतन्यफळांनी लिगडला ।
पक्षीसमुदाय लोटला । स्वानंदरस चाखाया ॥ ८ ॥
सेवूनिया स्वानंदरस । पूज्य झाले जगतास ।
अनुहत ध्वनि श्रवणास । अति आल्हाद देतसे ॥ ९ ॥
वासनेच्या पर्जन्यधारा । त्यांपासोनि तूंचि आसरा ।
सकलां करिसी निवारा । कृपासागरा गुरुमूर्ते ॥ १० ॥
जे जे तव आश्रया आले । ते तेथेंचि स्थिर झाले ।
पुन्हां परतोन नाहीं गेले । त्रिविधताप सोसाया ॥ ११ ॥
ऐशी तुझ्या छायेची गोडी । सुख वाढतें घडोघडी ।
संसारदुःखां वरपडीं । जाहलीं कितीयेक ॥ १२ ॥
अहंकारें उन्मत्त झाले । ते त्वदाश्रयासी मुकले ।
अहंकाररहित नम्र झाले । ते पावले निजरूपा ॥ १३ ॥
निबिड संसारकानन । अज्ञान अंधकार पसरला गहन ।
षड्रिपु श्वापदें हिंस्र दारुण । जीव नेती कुंभीपाकीं ॥ १४ ॥
ज्ञानसूर्य मावळला । विद्युन्मायेचा गलबला ।
शब्दज्ञान खद्योत भला । एकाचें एक दावितो ॥ १५ ॥
अनीति कांटेरी कुंपणें । अणुप्रवेशें करिती सदनें ।
यमकिंकरादि पिशुनें । भिवविती जीवासी ॥ १६ ॥
दारिद्र्यसर्प डसों येती । लोकेषणा वृश्चिक फिरती ।
कामेषणा गिळूं म्हणती । अजगर थोर काननींचे ॥ १७ ॥
ऐसा प्राणी बहु भ्रमला । आशा-तृष्णा-गर्तीं पडला ।
तंव अकस्मात भेटला । पूर्वसंचित सोबती ॥ १८ ॥
तेणें हातीं धरोनि नेला । जेथें ज्ञानतरु सद्‌गुरु भला ।
संतसमुदाय असे भरला । कृपाछायेसी ॥ १९ ॥
कोठें सूर्याऐसी दीप्ती । नांदे तेथें तो रघुपती ।
विवेक शूर सेनापती । श्वापदें दूर पळवीतसे ॥ २० ॥
आनंद भरोन आनंदरूप । प्राणि होत निस्ताप ।
द्वैत भावना संकल्प । विरोनि जाती मुळींहुनीं ॥ २१ ॥
ऐसा तूं सद्‌गुरुवरा । संसारकाननींचा आसरा ।
निःस्वार्थदाता दुसरा । दिसेना त्रिखंडा शोधिल्या ॥ २२ ॥
अखंड अगाध अविनाशी । नामरूप भेद न ज्यासी ।
भक्तांकारणें तूं साकारशी । निरुपाधि निराकारा ॥ २३ ॥
दयेचा निधि असे भरला । अनंत जीव शांतविला ।
धर्म आदरें संरक्षिला । अधर्मप्रवर्तकयुगीं ॥ २४ ॥
कैसें युगाचें महिमान । अधर्मकर्मीं प्रेम गहन ।
दुर्जन तेचि भाग्यवान । दिसों लागले ॥ २५ ॥
देहममता बहु लागली । तेणें सुखसाधनें जमविलीं ।
धर्महानि होऊं लागली । हें ध्यानीं येईना ॥ २६ ॥
धर्मबीजरक्षणकर्ते । विप्र वागूं लागले भलते ।
यजनादिक कर्में निरुतें । राहिलीं पूर्वापार ॥ २७ ॥
राहिलें केवळ वाग्जाळ । अर्थभाग्याची पडली भुरळ ।
तेणें मति जाहली चंचल । आत्मानुभव दूर राहिला ॥ २८ ॥
येणेंचि रीती सर्व वर्ण । अनेक मतें भिन्न भिन्न ।
उपहासती अन्योन्यालागून । सत्य कांहींच उमगेना ॥ २९ ॥
धर्में मर्यादा कथियेली । कर्में सर्व आंखून दिलीं ।
तीं सोडितां सत्ता बुडाली । उभय लोकींची ॥ ३० ॥
दैवी शक्ति समूळ गेली । मानवी सत्ता राहिली ।
धर्मभेदें दुही माजली । तेणें आली विकळता ॥ ३१ ॥
धर्म जीवाचें जीवन । धर्म राष्ट्राचें भूषण ।
अभ्युदयासी कारण । धर्मचि एक ॥ ३२ ॥
धर्मविन्मुख जे झाले । इहपर सुखासी मुकले ।
आचार सर्वही भासले । निरर्थक सकळांसी ॥ ३३ ॥
शरीरीं रोग अति गहन । आणि पथ्य दिधलें सोडून ।
मग औषध वाटे गुणहीन । रोगिया जैसें ॥ ३४ ॥
शब्दज्ञानी शहाणें ठरलें । भाविक मूर्खामाजीं गणले ।
अनुभव नेत्र जातां आंधळे । होवोन भांडती परस्परें ॥ ३५ ॥
धर्मदुही बहु जाहली । तेणें समाजा फुटी पडली ।
आपली आपणा वैरी झाली । दुजीयाची काय कथा ॥ ३६ ॥
स्वात्मसुख स्वप्नवत्‌ । होवोनि झाले विषयासक्त ।
विषयीं द्वैताची मात । सहजचि आली ॥ ३७ ॥
विषयीं वाढे अनाचार । विषयीं वाढे मत्सर ।
विषय व्यसनाचें माहेर । विषय तनु जीर्ण करिती ॥ ३८ ॥
विषय साधनीं विक्षेप । विषय म्हणजे महापाप ।
विषय वाढविती संताप । विषय विषया वाढविती ॥ ३९ ॥ धर्महीन झाले सकळ । गेलें ऐक्यतेचें बळ ।
पराधीनतेनें विकळ । होऊं लागले ॥ ४० ॥
भगवदाज्ञें कलि आला । तैसा धर्म क्षीण झाला ।
बोल नाहीं इतरांला । ऐसें पूर्वींच कथियेलें ॥ ४१ ॥
प्रारब्धें रोग झाला । परि प्रयत्नेंथ पाहिजे हटविला ।
कांहीं काळ तरी सुखाचा गेला । म्हणजे बरें ॥ ४२ ॥
यास्तव साधू अवतरती । वेळोवेळीं धर्म रक्षिती ।
कलि प्रबल झाला जगतीं । परि कांहींसा उपाय ॥ ४३ ॥
कलीनें बुद्धि भारली । कलीनें क्षिति व्यापिली ।
प्रथम चरणीं गति झाली । प्रत्यक्ष पहा ॥ ४४ ॥
वर्णाश्रमधर्म राहिला । मतामतांचा गलबला ।
मूर्तिपूजेसी कंटाळला । प्राणी दिसे ॥ ४५ ॥
काम्यकर्में कांही राहिलीं । नैष्कर्म्यता समूळ गेली ।
धर्ममर्यादा शिथिल झाली । रूढी पडल्या अनेक ॥ ४६ ॥
देश सुपीक साजिरा । तेणें आळसा झाला थारा ।
धनिकसुत दिसे बरा । परि बहुधा गुणहीन ॥ ४७ ॥
आळसें आला करंटपणा । धूर्त मारिती टोमणा ।
अन्नवस्त्रा बापुडवाणा । होवोनि गेला ॥ ४८ ॥
करूं नये तेंचि करिती । भ्रष्टाकार माजविती ।
कोठेंही मिळेना शांति । मति भ्रष्ट जाहली ॥ ४९ ॥
उदरपूर्तीकारणें । लागे नीचसेवा करणें ।
योग्यायोग्य कोण जाणे । धनसंग्रह मुख्य काज ॥ ५० ॥
सत्य विश्वास उडाला । असत्य अविश्वास भरला ।
कामिकांचा सुकाळ झाला । आपपर नेणती ॥ ५१ ॥
एवढेंच मानिती भाग्य । तेंचि पुरुषार्थाचें अंग ।
कुलकलंक निःसंग । नारीनर किती झाले ॥ ५२ ॥
अधर्में धरणी पिकेना । पिकतां खाऊं देईना ।
निःशक्तासी रोग नाना । नवे नवे उद्भवती ॥ ५३ ॥
प्रथमचरणीं ऐसी स्थिती । अंती होईल कोण गती ।
पशुसम मानव होती । प्रज्ञाबल तेजहीन ॥ ५४ ॥
पुराणें सांगती बहुत । पुनरावृत्ति नको येथ ।
कार्यकारण ऐसें कथित । श्रोतीं रोष न धरावा ॥ ५५ ॥
अधर्मा आणिक कारण । धनसंचय मुख्य ध्येय जाण ।
त्यालागीं वेंचिती प्राण । आणि घेती इतरांचे ॥ ५६ ॥
पोटचें मांस विकून खाती । वयसीमाही न पाहती ।
त्यांच्या जिण्या पडो माती । वृद्धां विवाहीं देती बालिका ॥ ५७ ॥
तेणें घडती अनाचार । कुलक्षय झाले फार ।
भेसळ जाती अनिवार । होवोनि गेल्या ॥ ५८ ॥
उद्भव तैसा अंकुर । तैसी बुद्धी आणि विचार ।
पाखांड माजलें फार । धार्मिकासी निंदिती ॥ ५९ ॥
धर्म झाला दुबळा । रूढीनें विसंग पावला ।
परकीयांनीं लाग साधिला । छिद्रें शोधूं लागले ॥ ६० ॥
दीन दारिद्र्यें पीडिले । अथवा धनाशे जे भुलले ।
मायिक वैभवासी भाळले । तयां तयां भ्रष्टविती ॥ ६१ ॥
विहित आचार कळेना । रूढींत तत्त्व मिळेना ।
कळतें तेंहि वळेना । विषयासक्तीचेनि योगें ॥ ६२ ॥
देह विषय-व्यसनाधीन । तेणें अत्यंत जाहला क्षीण ।
पद्मपत्रींचें जीवन । तैसें आयुष्य जाहलें ॥ ६३ ॥
लहान शिकविती थोरास । मिथ्या म्हणती वेदश्रुतीस ।
स्त्रिया ठेविती पतीस । सत्तेखालीं आपुल्या ॥ ६४ ॥
सूकरी बहुत प्रसवली । दुबळी संतती वाढली ।
अल्पकाळीं मुखीं पडली । महाथोर मृत्यूच्या ॥ ६५ ॥
रोगें आयुष्य क्षीण झालें । जोडपें विजोडतां पावलें ।
पुनरावृत्ति करूं लागले । पशु जैसे ॥ ६६ ॥
आणिकही बहुत प्रकार । लिहितां ग्रंथीं ये विकार ।
खेचरी सृष्टी अनिवार । होवोनि गेली ॥ ६७ ॥
स्त्रीपुरुष दोघेजण । राहती पक्ष्यांसमान ।
आप्तइीष्ट बंधुजन । पर्वा न करिती कोणाची ॥ ६८ ॥
आहारविहार सात्त्विक । जावोन रजतमात्मक ।
राहतां बुद्धीही निःशंक । राजस तामस वाढली ॥ ७० ॥
रजप्रधान बुद्धि जाहली । सुखाची अति हांव सुटली ।
यांत्रिक कला निघों लागली । अधिकाधिक ॥ ७१ ॥
प्रवृत्तिज्ञान भेदयुक्त । भेद भेदा वाढवित ।
अष्टधेचा कर्दम बहुत । दुरत्यय मानवा ॥ ७२ ॥
जितुकें शोधोनि काढावें । तितुकें गूढचि स्वभावें ।
अनंतजन्म शिणावें । तरी ज्ञान पुरेना ॥ ७३ ॥
आदिमाया विश्वजननी । चौर्यांनशी लक्ष जीवयोनी ।
अनंत ब्रह्मांडे जिचेनि । सत्तामात्रें चालती ॥ ७४ ॥
पंचमहाभूतांचा मेळा । वासनाकर्दमा निराळा ।
प्रकृतिपुरुषांचा सोहळा । रामचि जाणे ॥ ७५ ॥
असो राजस ज्ञान फोंफावलें । तमोमिश्रित भ्रष्ट झाले ।
चित्तशुद्धीसी मुकले । धन्य कलियुगाची ॥ ७६ ॥
येथें जे स्मरले राम । तेचि पावले विश्राम ।
सर्वां घटीं आत्माराम । आदिअंतीं निर्मळ ॥ ७७ ॥
रामभक्त सद्‌गुरुराय । सद्धर्मा करिती साह्य ।
पुढील समासीं तेंचि ध्येय । श्रोतेजनीं परिसावें ॥ ७८ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय नववा
समास दुसरा

अधर्म वाढिला गहन । अति बळावले दुर्जन ।
साधुसंतांचे छळण । मांडिलें बहुत ॥ १ ॥
कुलस्त्रिया भ्रष्टविती । सद्धर्मासी निंदिती ।
धेनू कसाया अर्पिती । हायहाय दुर्दिन ॥ २ ॥
कित्येक कन्याविक्रय करिती । बहु परधर्म स्वीकारिती ।
स्वधर्मीं आचार सांडिती । राहिले आडनांवाचे ॥ ३ ॥
कांहीं केवळ श्रद्धावान । आदरें करिती स्वधर्माचरण ।
परि मार्गदर्शक त्यांलागुन । अनुभवज्ञानी मिळेना ॥ ४ ॥
बाह्यस्थिति विपरित । तेणें चित्त होय विस्खलित ।
श्रद्धा डळमळोनि साधनीं येत । अनिवार विक्षेप ॥ ५ ॥
बोलके पंडित ते किती । धर्मज्ञानी म्हणविती ।
परि आचार आणि नीति । विपरीत दिसे ॥ ६ ॥
असो ऐशा समयाला । सद्‌गुरुमहाराज अवतरला ।
बहुतांसी आश्रयो झाला । तेंचि पुढती कथन करूं ॥ ७ ॥
हिंसाधर्मी वाढले जन । नित्य करिती पशुहनन ।
बळेंच विरुद्धाचरण । करावया सुख वाटे ॥ ८ ॥
हृदयस्थ जनार्दन । हें शास्त्राचें वचन ।
जीवशिवांचा योग जाण । अतिनिकट ॥ ९ ॥
जीवमात्र जगदीश्वर । ऐसा शास्त्रांचा विचार ।
देहममत्व अनिवार । लागे मायासंयोगें ॥ १० ॥
देहासी करितां दंडण । जीवासी दुःख होत दारुण ।
पाहावें प्रत्यक्ष प्रमाण । आपुलेपाशीं ॥ ११ ॥
यास्तव अहिंसा मुख्य नेम । त्यांतहि भेद असती सूक्ष्म ।
सत्त्वप्रधान निरुपद्रवी परम । ऐसे जीव तरी दुखवूं नये ॥ १३ ॥
श्रीहरीची पूजास्थाने । गाई ब्राह्मण वन्हि जीवने ।
अतिथि प्रतिमास्थानें । वृक्षादी अनेक ॥ १४ ॥
यांतीलही मुख्य गाय । आम्हां भारतीयांची माय ।
तिचा करोनि विक्रय । घात करिती आपुला ॥ १५ ॥
माय देती कसाबाहातीं । त्यांच्या जिण्या पडो माती ।
तिच्या उपकारातें नेणती । अज्ञानांध जन झाले ॥ १६ ॥
वेद शास्त्रें वर्णिती कीर्ती । तेहतीस कोटी देव वसती ।
रोमरंध्री ऋषि राहती । ऐसी धेनू पवित्र ॥ १७ ॥
ब्रह्मा विष्णु महेश । पाठीं पोटीं मुखास ।
चंद्र सूर्य नेत्रांस । राहोनिया शोभविती ॥ १८ ॥
अष्टदिक्पाळ भैरव । आदित्यादि ग्रह सर्व ।
तेहतीस कोटी राहती देव । उदरामाजीं जियेच्या ॥ १९ ॥
मूत्रस्थानीं गंगा राहे । पय प्रत्यक्ष अमृत पाहे ।
पृच्छीं नाग शोभताहे । धन्य जियेचें दर्शन ॥ २० ॥
जियेचे जिणें परोपकारी । जी सदा निर्विकारी ।
पुत्रपौत्रांसहित चाकरी । मानवाची करितसे ॥ २१ ॥
तेचि मानव निष्ठुरपणें । कृत्य करिती लाजिरवाणें ।
वत्सापरी पय सेवणें । परि उपकार फेडिती गळफांसे ॥ २२ ॥
पुत्र क्षेत्र सोज्वळ करी । धान्यराशी पडती घरी ।
दुष्ट तयांसी संहारी । वाहवा रे युगधर्म ॥ २३ ॥
जियेचें मलमूत्र आणि पय । अगणित उपकार हेंचि ध्येय ।
शरीरस्वास्थ्याची सोय । निर्मिली देवें ॥ २४ ॥
पयःपान जे करिती । आयुष्यबळ आणि मति ।
वाढोनिया मनोगति । स्थिर होय ॥ २५ ॥
अपस्मारादि भ्रमरोग । रक्तदोषीं अनंत भोग ।
जीर्णज्वर पांडुरोग । क्षयादि नाश पावती ॥ २६ ॥
हृदय संबंधी विकार । मूत्रकृच्छ पित्त विखार ।
दाहोन्माद श्रमपरिहार । अमृत मर्त्यलोकींचे । २७ ॥
तैसेचि बहुरोगांसी पथ्यकर वदती । भिषगृषि ।
बालतरुणवृद्धांसी । अनायासे पचतसे ॥ २८ ॥
सर्वांसी दे समाधान । रुचिकर मधुर असे जाण ।
देवाप्रिय सत्त्वप्रधान । गोदुग्ध जाणावें ॥ २९ ॥
मायदूध दोषी झालें । तरी गोदुग्ध पाजिती भले ।
दुजी माय नेणोनि भ्रमले । आश्चर्य वाटे ॥ ३० ॥
तैसाचि गोमूत्रप्रताप । दर्शनें हरतें पाप ।
प्राशनें निरसे बहु ताप । व्याधिजन्य विकार ॥ ३१ ॥
सेवितां वाढते बुद्धि । औषधांमाजी महौषधि ।
कफ आणि वात व्याधी- । पासोनि करी निर्मुक्त ॥ ३२ ॥
कुष्ठ गुल्म आणि उदर । पांडु अर्श कंडू विकार ।
नेत्ररोग सांथीचे ज्वर । पाठवी दूरदेशीं ॥ ३३ ॥
क्षार रक्तशुद्धि करित । नाना जंतू निवारित ।
अरुचि घालवूनि आल्हाद देत । मानवासी गोमूत्र ॥ ३४ ॥
गोमय तेंही प्रसिद्ध । देव महानुभाव सिद्ध ।
सर्वांसी प्रिय असे शुद्ध । महिमा किती वर्णावा ॥ ३५ ॥
हवा शुद्ध करावयासी । दुजी वस्तु नसे ऐसी ।
मत्कुणादि कृमींसी । हौऊंच नेदी ॥ ३६ ॥
पय प्रधान पित्तनाशी । मूत्र कफातें निरसी ।
गोमय वात शुद्धीसी । करतें मानवहितार्थ ॥ ३७ ॥
ऐसी ही मायधेनु । साक्षात्‌ हीच कामधेनू ।
उपकृतीवांचूनि आनु । कार्य नसे जियेचें ॥ ३८ ॥
जे जे इचा घात करिती । ते आपुलाचि घात योजिती ।
ऐसें इतिहास सांगती । दृष्टी फिरवा माघारी ॥ ३९ ॥
परि या कलीची राहटी । पुराणेंच म्हणती खोटी ।
तेथें काय सांगाव्या गोष्टी । दृष्टांतरूपें ॥ ४० ॥
परि प्रत्यक्ष उपयोग होतो । हा तरी प्रत्यय येतो ।
म्हणोनि सकळांसी विनवितो । उपेक्षा न करा धेनूची ॥ ४१ ॥
असो इतुके सांगावया काज । गोपालक महाराज ।
गोरक्षण धर्मबीज । असे एक ॥ ४२ ॥
प्रसिद्ध क्षेत्र म्हसवडासी । हाट भरे प्रतिसप्ताहासी ।
धेनु नेती गळफांसी । दुष्ट कसाब कितीएक ॥ ४३ ॥
सद्‌गुरु तेथें जावोनी । सांगती तें मोल देवोनी ।
असंख्य धेनू आणिती सदनी । वारंवार ॥ ४४ ॥
भव्य गोशाळा बांधोन । आदरें करिती संरक्षण ।
अभ्यंकर कारकून । नेमिले तयावरी ॥ ४५ ॥
वरचेवरी किती येती । गोप्रदानें किती जाती ।
पाहतां वाटे ही शक्ति । मानवी नव्हे ॥ ४६ ॥
सुकाळीं नेती पाळावयासी । दुष्काळीं सोडिती गुरुपाशीं ।
वेंचिति किती धनराशी । देव जाणे ॥ ४७ ॥
गंगी नामें गाय लंगडी । कदाही गुरूची पाठ न सोडी ।
दर्शनाची अति गोडी । पशूसही वाटतसे ॥ ४८ ॥ गोशाळेंत सद्‌गुरुस्वारी । जाऊनि बैसे वरचेवरी ।
झाड लोट करिती साजिरी । स्वहस्तें आनंदें ॥ ४९ ॥
गोसेवा करावयासी । लाविले महारोगियांसी ।
मुक्त झाले बहुतांशी । गोसेवासुकृतें ॥ ५० ॥
गाईची सेवा करितां । संतुष्ट होती समस्त देवता ।
ग्रहपीडा न बाधे सर्वथा । मनकामना सफल होय ॥ ५१ ॥
धेनुमाय जयाचे गृहीं । पयःपान करिती पाहीं ।
गोमयें सारविती मही । सडे घालिती साजिरे ॥ ५२ ॥
क्वदित्‌ गोमूत्र सेविती । धेनुसन्निध वास करिती ।
तयांची प्रगल्भ होय मति । निरोगी राहती सर्वकाळ ॥ ५३ ॥
सत्त्वगुण नांदे तेथें । संतति बळवान होते ।
भाग्य नाही शांतीपरतें । भोगिती तें अनायासें ॥ ५४ ॥
वांझ स्त्री गाईची सेवा करी । तरी पुत्र खेळतील तिचे घरी ।
गोप्रदानें यमपुरी । वैतरणी ने पैलपार ॥ ५५ ॥
द्विमुख गाईसी प्रदक्षिणा । घालितां त्रिभुवनासी जाणा ।
प्रदक्षिणेचें फल तयांना । मिळेल निश्चयें ॥ ५६ ॥
सवत्स धेनु दान करितां । पृथ्वीदानफल ये हाता ।
दान घे त्यासी समर्थता । असावी मात्र ॥ ५७ ॥
गाईसी घालितां चारा । सुख होईल समस्त पितरां ।
आशीर्वाद देती तया नरा । पुत्रधनसमृद्धि ॥ ५८ ॥
वासुदेव स्वयें सेवा करित । तेथें मानवाची काय मात ।
दत्त गोरक्ष समर्थ । ऋषि सिद्ध महामुनी ॥ ५९ ॥
असो गोसेवा ऐसी । सद्‌गुरु करिती आदरेंसी ।
करविती, बोधिती सकलांसी । गोशुश्रूषा करावी ॥ ६० ॥
एकदां ऐसा प्रकार घडला । खाटिक आले गोंदावलीला ।
संगे घेवोनि धेनूंला । वधायासी चालिले ॥ ६१ ॥
मार्गें गोंदावलीस येता । वार्ता कळली सद्‌गुरुनाथा ।
पाचारूनि तयां समस्तां । वदती ’गाई न न्याव्या ॥ ६२ ॥
यांचे मोल आम्ही देतों । आदरें सर्व संरक्षितो ।
तुम्हांसीही ऐसें कथितों । मायवध न करावा ॥ ६३ ॥
चिंताग्रस्त झाल्या दिसती । पुढील भविष्य आणोनि चित्तीं ।
दीनवदनें करुणा भाकिती । हाय हाय युगधर्म ॥ ६४ ॥
अश्रु ढाळिती नयनांतुनी । गोड न लागे अन्नपाणी ।
दिसूं लागली यमजाचणी । प्राणांतसमयाची ॥ ६५ ॥
जीव प्रिय सकलांसी । कल्पना करा तुम्हीं मानसीं ।
भेट झालिया व्याघ्रासी । काय अवस्था होईल’ ॥ ६६ ॥
कसाई वदती निष्ठुर । ’अज्ञानी पशु हे साचार ।
कोठला यां ज्ञानविचार । असेल तरी दावावें ॥ ६७ ॥
निर्बंधन करूनि चारा । घलितों, तुम्ही हांका मारा ।
जरी असेल ज्ञानझरा । तरी धांवोन येतील ॥ ६८ ॥
धांवोन येतां समस्त । सोडून देऊं नेमस्त ।
ना तरी शीघ्र वधाप्रत । नेऊं सत्य जाणावें’ ॥ ६९ ॥
सद्‌गुरु तया रुकार देती । दुष्ट कसाई तैसें करिती ।
दूर राहोन पाचारिती । नामें घेवोन गुरुराव ॥ ७० ॥
’गंगे यमुने गोदावरी । तुंगे कृष्णे या सत्वरीं ।
कपिले वारणे आणि मधुरी । दासासमीप धांवा गे’ ॥ ७१ ॥
ऐसें वदतां ते अवसरीं । धांवोन आलीं तीं सारीं ।
कोणी शेंपूट उभारी । कोणी फोडी हंबरडें ॥ ७२ ॥
चरण चाटोन क्षालन करिती । कोणी मुखाकडे पाहती ।
कांही उगाच हुंगिती । सद्‌गुरुराजयांसी ॥ ७३ ॥
भोंवती धेनूंचा समुदाव । मध्यें शोभे सद्‌गुरुराव ।
वाटे दुजा वासुदेव । वृंदावनीं उभा असे ॥ ७४ ॥
असो ऐसी घडतां स्थिति । अनुताप पावले दुर्मति ।
ढळढळां अश्रु ढाळिती । आम्ही अतिपातकी म्हणोनी ॥ ७५ ॥
सद्‌गुरु केवळ दयामूर्ती । सकळांसी भोजन घालिती ।
’पुनरपि ऐसी नीचवृत्ती । तुम्ही सर्वथा न करावी’ ॥ ७६ ॥
असो मोल देवोनि तयांसी । पाठविलें स्वसदनासी ।
ऐशी आस्था श्रीगुरूंसी । धेनूविषयीं अतिशय ॥ ७७ ॥
कृष्णराव गांवकामगार । धनगरी भिकवडीकर ।
श्रीगुरुपासोन चार । नेती पाळावया ॥ ७८ ॥
परि बहु अनास्था केली । जनावरें मरों घातलीं ।
दृष्टांत होय ते काळीं । गाई माघारीं पोंचवाव्या ॥ ७९ ॥
वदती चालण्या शक्ति नाहीं । तरी रामतीर्थ लवलाहीं ।
देवोन पोंचवी पाहीं । अनास्था त्वां बहु केली ॥ ८० ॥
गायी येतां गळां पडती । भारी भोगिल्या विपत्ती ।
येक गाय रामापुढती । मरतां गंगा घातली ॥ ८१ ॥
करविती सकलां नामगजर । गुरुक्षेत्र वाटे काशीपुर ।
अंतकाळीं गुरुवर । प्राणियां देती सद्‌गति ॥ ८२ ॥
वामनराव पेंढारकर । मोरगिरी मंदिरींचे भक्त थोर ।
त्यांचे पुत्राचा समाचार । श्रोतेजनीं परिसावा ॥ ८३ ॥
बहुतांदिवशीं सुत झाला । परि देहव्याधीनें पीडिला ।
गुरुदर्शना आणिला । गोंदावलेग्रामीं ॥ ८४ ॥
काळवेळ जवळी । ती श्रींनी जाणितली ।
गंगा घातली मुखकमळीं । तुळशी कर्णरंध्रांत ॥ ८५ ॥
पित्याहस्तें गोप्रदान । स्वसंकल्पें देववोन ।
अज्ञान अर्भका उपदेशोन । वैकुंठासी धाडिती ॥ ८६ ॥
रामापुढती ठेवोन । म्हणती करा सर्वही भजन ।
दशदानें देववोन । बाळ नेलें मोक्षासी ॥ ८७ ॥
ब्रह्मानंद स्वहस्तेंसी । दहन करिती बालकासी ।
कर्पूर तुळशी चंदनासी । इंधनीं त्या घालोन ॥ ८८ ।
मायबाप असोन जावळी । अश्रु न ढाळिती ते वेळीं ।
महदाश्चर्य मानिती सकळी । धन्य गुरूंचे बोधामृत ॥ ८९ ॥
लग्नसोहळा मृतसोहळा । गुरुगृहीं एकचि लीला ।
मायोद्भवविकाराला । पुसे कोण ॥ ९० ॥
एकदां ऐसें झालें । मंदिरापुढती गाढव पडलें ।
प्राणांतव्याधीनें ग्रासिलें । दैवें आलें संतद्वारीं ॥ ९१ ॥
यमपाशी जीव ओढे । लोभें देहींच तडफडे ।
शिष्यें कथितां पवाडे । दयासागर ते ठायीं ॥ ९२ ॥
गंगा घालोन मुखांत । अंगावरोन फिरविती हात ।
पवित्र नामगजरांत । सद्‌गति देती तयासी ॥ ९३ ।
येणें प्रकारें बहुतांसी । अंतीं नेती सद्‌गतीसी ।
ग्रंथविस्तारभयासी । धरोन संकेत दाविला ॥ ९४ ॥
सकळां भूतीं दया समान । परि आदरें गोशुश्रूषण ।
करिती काल जाणोन । श्रोते पुढतीं अवधारा ॥ ९५ ॥
दुजें देवपूजास्थान । गरीब सत्पत्र ब्राह्मण ।
अतिथी मानवी अन्नदान । करिती पुढें परिसावें ॥ ९६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय नववा
समास तिसरा

अन्न म्हणजे ब्रह्म पूर्ण । जीवन तो नारायण ।
अन्नभोक्ता भगवान । जठरानलरूपी ॥ १ ॥
अन्न जीवा रक्षण करतें । अन्न जीवा शांतवितें ।
दान नाहीं यापरतें । त्रिभुवनीं आणिक ॥ २ ॥
जीवन जीवासी जीववितें । जीवन जीवरूप निरुतें ।
जीवन वदतांच आल्हाद देतें । प्राणिमात्रांसी ॥ ३ ॥
क्षुधातृषेचें दुःख भारी । झोंबतें प्राण्या दोप्रहरीं ।
यादुःखाची सरी । दुज्या कशाशी नसे ॥ ४ ॥
अन्नदाता पितया समान । अन्नदाता धार्मिक गहन ।
अन्नदाता श्रेष्ठ पूर्ण । दातयांमाजी ॥ ५ ॥
अन्नदानें प्रायश्चित्त घडे । अन्नदानें दोष उडे ।
अन्नदानें सुकृत जोडे । व्याधी हरती अन्नदानें ॥ ६ ॥
अन्नदानें देवतांसी । अन्नदानें पितरांसी ।
अन्नदानें भूतांसी । आनंद होय ॥ ७ ॥
बहुत करितां द्रव्यदान । अथवा अमोल वस्तुदान ।
तरी तृप्ति अन्नदानासमान । आणिक कोठें आढळेना ॥ ८ ॥
सकळ जीवां अन्नदान । करणें हें उचित जाण ।
सामर्थ्य नसतां त्यांतही प्रधान । कथिती तें परिसावें ॥ ९ ॥
संन्यासी अतिथि ब्रह्मचारी । भुकेनें पीडित नीच जरी ।
विप्र विद्यार्थी सदाचारी । साधक सिद्ध संतजन ॥ १० ॥
अडचणींत गवसला जो देख । पोटार्थी देशसेवक ।
पांथिक अज्ञान अर्भक । व्यंग दीन परोपकारी ॥ ११ ॥
आणि जीं देवतामुखें । अग्नि जीवन धेन्वादिकें ।
त्यांसी अन्न अर्पितां निकें । अगणित सुकृत हातीं ये ॥ १२ ॥
जे वेदविद्या पठण करिती । जे अध्यात्मज्ञानें रंगोनि जाती ।
ज्यांसी बाणली वैराग्यस्थिति । तयां अन्न देतां भलें ॥ १३ ॥
पशुपक्ष्यादिकांसी । अन्न द्यावें विवेकेंसी ।
भुकेजल्या व्याघ्रासी । मास कधी अर्पू नये ॥ १४ ॥
विप्र असावा सदाचरणी । ब्रह्मचारी वेदपठणी ।
अहिंसायुक्त अन्न सदनीं । असेल तें अर्पावें ॥ १५ ॥
हिंसा म्हणजे परपीडा । चोरी लबाडी घात, हे सोडा ।
युक्त अन्न देतां जोडा । सुकृतासी दुजा नाहीं ॥ १६ ॥
अनंत सुकृतांच्या राशी । तरी घडे अन्नदानासी ।
तृप्ती नाहीं यासरसी । आणिक कोठें ॥ १७ ॥
सद्‌गुरु आम्हांसी वदती । विप्रोच्छिष्टें जे काढिती ।
तयांचीं उच्छिष्टें श्रीपती । स्वहस्तें काढितसे ॥ १८ ॥
सद्‌गुरुगृहीं सर्वकाळ । अन्नाचा होत सुकाळ ।
किती शमविती जठरानल । त्याची गणती असेना ॥ १९ ॥
मुमुक्षु साधक सिद्ध । थोर थोर येती प्रसिद्ध ।
वैदिक शास्त्री आणि वैद्य । विद्वज्जन कितियेक ॥ २० ॥
बहुत येती अन्नार्थी । स्त्रियां लेकुरां नसे मिती ।
चिंताग्रस्त तृप्त होती । धनिक आणि सदिच्छ ॥ २१ ॥
नित्य असे मुक्तद्वार । उपवासी न रहावा नर ।
येविषयीं खबरदार । असती सतत ॥ २२ ॥
गांवोगांवींचे येती नर । कोणी भिडस्त आळशी विसर ।
राहती, म्हणोन वरचेवर । निमंत्रणें पाठविती ॥ २३ ॥
इतुक्याही देतां सूचना । क्वचित्‌ कोणी राहतां जाणा ।
सर्वज्ञ ते सांगती खुणा । अमुक गृहस्था बोलवावें ॥ २४ ॥
धनिक विद्वान आणि दीन । सकळांसी एकचि अन्न ।
स्वहस्तें प्रसाद देऊन । जेवूं घालती अतिप्रीती ॥ २५ ॥
गुरुवारी समाराधना । नित्य होत उपासना ।
विप्रकुटुंबें गांवची जाणा । सकल जेवूण घालिती ॥ २६ ॥
गांवभोजनें ती किती । वरचेवरी अनेक होती ।
अठरापगड याती मिळती । तृप्त होती गुरुगृहीं ॥ २७ ॥
गोंदवलें गांव अति लहान । तेथें बाजार सुरू करोन ।
गुरुप्रिय गुरुवार जाणोन । नेमून दिला ॥ २८ ॥
कित्येक बाजार दिवशीं । पाचारती बाळा पाटलासी ।
वदती आज श्रीरामासी । नैवेद्य असे ॥ २९ ॥
मनुष्य न सोडावा बाजारी । जेवूं घाला पोटभरी ।
तदनंतर गांवची सारीं । रामप्रसाद सेवावा ॥ ३० ॥
कोणी शिधासाहित्य देती । काहिली चुलाणीं ठेवती ।
पुरुष इतर पाक करिती । स्त्रिया भाजिती पुरणपोळ्या ॥ ३१ ॥
चुलींच्या करिती हारी । वाटे यात्रा ही साजिरी ।
सत्ताधीश गुरूचे घरीं । गांवोगांवची भरलीसे ॥ ३२ ॥
असो बाजारी जेवोन जाती । मग गांवची सकल येती ।
स्वहस्ते श्रीगुरु वाढिती । आग्रहातें करकरोनी ॥ ३३ ॥
तो सोहळा अपूर्व । जेथें नांदे गुरुराव ।
प्रसादा येती वाटे देव । मनुष्यवेष घेवोनी ॥ ३४ ॥आणि उत्साहीं विशेष । यात्रा भरे गोंदवलेस ।
तेसमयीं अन्नदानास । गणती कोण करील ॥ ३५ ॥
नित्य उत्साह गुरुगृहीं । त्यांतही विशेषत्वें पाहीं ।
परिसा श्रोते सर्वही । एकचित्तें गुरुमहिमा ॥ ३६ ॥
चैत्र शुद्ध नवमीसी । यात्रा भरे दहा दिवसीं ।
आषाढ शुद्ध पौर्णिमेसी । नामसप्ताह गुरुघरचा ॥ ३७ ॥
गुरुपूजेचा तो दिवस । धांवोन येती सकल शिष्य ।
सोहळा तो विशेष । आनंद न समाये अंतरी ॥ ३८ ॥
माघमासीं दासनवमी । उत्साह होत गुरुधामीं ।
झोळी कुबडी जे नेमी । दिक्षाधारी करिती भिक्षा ॥ ३९ ॥
एकनाथ नामदेव तुकाराम । पुण्यतिथीचा सोहळा परम ।
जयंत्या सण नित्यनेम । महाप्रसाद होतसे ॥ ४० ॥
जपानुष्ठानसांगता किती । उपनयनें विवाह होती ।
बारशादी संस्कार चालती । नित्य पोळी गुरुगृही ॥ ४१ ॥
भोजनाआधीं ’जय जय श्रीराम’ । या घोषाचा असे नेम ।
मध्यें श्लोक आर्याही सुगम । प्रेमानंदें गर्जती ॥ ४२ ॥
नामस्मरणी भोजन करतां । कित्येकांच्या हरल्या व्यथा ।
प्रसादरुचि न ये वर्णितां । भाविकांसी अति प्रिय ॥ ४३ ॥
व्याधिपीडित जनांसी । रामतीर्थ औषधी खाशी ।
प्रसाद देता पथ्यासी । रोगमुक्त व्हावया ॥ ४४ ॥
सद्‌गुरूंचे चरणतीर्थ । सेवितां समाधान होत ।
नित्य घेती गुरुभक्त । अत्यानंदें ॥ ४५ ॥
प्रसादें रोग जाती । प्रसादें चित्तशुद्धी होती ।
प्रसादें वाढे भगवद्भंक्ति । महिमा किती वर्णावा ॥ ४६ ॥
प्रसादें अन्नपूर्णा प्रसन्न । कदापिही न पडे न्यून ।
तोही प्रकार सांगेन विशद करोनी ॥ ४७ ॥
प्रातःकाळी पाक करिती । सामुग्री घेती उपस्थित जनांपुरती ।
दोप्रहरीं भक्त येती । क्वचित्काळीं अनेक ॥ ४८ ॥
शेंदीडशें लोक येती । त्यांतचि देखा तृप्त करिती ।
ऐसे गुरु कौतुक दाविती । महदश्चर्य कलियुगीं ॥ ४९ ॥
ब्रह्मानंदांसी दर्शन । द्यावया कर्नाटकीं जाण ।
गेले, तेथें एक शेर अन्न । शतकांसी पुरविले ॥ ५० ॥
तैसीच उपहाराची स्थिति । अल्प परि सकळां वाढिती ।
ऐसे प्रकार नित्य घडती । अन्नपूर्णा वास करी ॥ ५१ ॥
इंदुरी असतां गुरुवर । दुष्काळ पडला असे थोर ।
तेव्हां श्रींचे द्रवलें अंतर । जेवूं घालिती गरिबांसी ॥ ५२ ॥
किती लोक आले धाले । किती अन्न खर्च झाले ।
हिशेब कोणा न कळे । गुरुगृहींचा ॥ ५३ ॥
हिशेब केवळ भाजीचा । राखिला कोणी समयाचा ।
जाहला बहुत शतकांचा । आश्चर्य वाटे सकळांसी ॥ ५४ ॥
गोंदावलीस असतां किती । वारकरी जेवूं घालिती ।
शिबिका दिंड्या मार्गावरती । येतां आदरें जेवविले ॥ ५५ ॥
भोजनाचा ऐसा प्रकार । क्वचित्‌ केवळ मीठभाकर ।
क्वचित्‌ पक्वान्नें मधुर । ऊर्मी एक राहीना ॥ ५६ ॥
कर्णासारखी दानशूरता । क्वचित्‌ दाविती हीनता ।
भिकार्याख पाशी भीक मागतां । लाभ काय होईल ॥ ५७ ॥
क्वचित्‌ भिक्षा मागती । क्वचित्‌ ग्रामभोजनें करिती ।
अंत कोणा न लागों न देती । ऊर्मी एक तगेना ॥ ५८ ॥
क्वचित्‌ कफनी भरजरीची । क्वचित्‌ कौपीन चिंधीची ।
खूण जाणा गुरुघरची । ” आहे आहे, नाही नाही” ॥ ५९ ॥
उदकपूर्ति तैशाच रिती । ज्ञानवापीतीराप्रति ।
घाट बांधोन कुंडें करिती । शीत स्वच्छ झर्यांयची ॥ ६० ॥
खालती वरती पाणी कमी । परि येथेंच वाहतसे नामी ।
ईशकृपा सद्‌गुरुधामीं । साच साच ॥ ६१ ॥
असो अन्नोदकाचा सुकाळ । नित्य करिती गुरुदयाळ ।
जपतां तयांची नाममाळ । तृष्णाताप निवेल ॥ ६२ ॥
व्याधिग्रस्तां वैद्य मिळाला । भूतखेतां मांत्रिक झाला ।
दरिद्रियांसी धनिक भेटला । गुरुराजयोगी ॥ ६३ ॥
आन्नार्थियांसी अन्नदाता । वेदांतियांसी सर्वज्ञता ।
धेनूंसी होय प्राणदाता । योगियां योग शिकवितसे ॥ ६४ ॥
नास्तिकां साधनीं लावित । साधकां सिद्ध करित ।
भाविकांसी दावोनि देत । निजरूप ॥ ६५ ॥
भाविक नास्तिक हठयोगी । यांसी लावितसे सन्मार्गीं ।
ऐसी माय भेटली जगीं । तो येक धन्य पुरुष ॥ ६६ ॥
असो साधका साधन करावयासी । मंदिरें बांधविती कैसीं ।
हेंचि कथा पुढील समासी । श्रोते हो द्यावें अवधान ॥ ६७ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय नववा
समास चवथा

ब्रह्मचैतन्य सद्‌गुरुराणा । सकलां सांगे उपासना ।
मुख्य स्मरणभक्ति जाणा । दुजी आत्मनिवेदन ॥ १ ॥
आणिक ज्या उरल्या भक्ति । त्यांकारणें मंदिराप्रति ।
पाहिजें जाणोन चितीं । करविती अनेक ॥ २ ॥
भक्तीचे नवविध प्रकार । श्रवण कीर्तन नामगजर ।
सेवा अर्चन नमस्कार । दास्य सख्य निवेदन ॥ ३ ॥
घडतां नवविधा भक्ती । सहज मिळे जीवा शांति ।
नवविध भक्ति सहज घडती । मंदिरांमाजी ॥ ४ ॥
मंदिरीं पुराणश्रवण घडे । मंदिरीं कीर्ति डोळ्यांपुढें ।
स्मरण तें मागें पुढें । सहजचि राही ॥ ५ ॥
मंदिर बांधाया काज । सद्बोाध हेंचि एक बीज ।
बोधकर्ता गुरुराज । दृष्टीसमोर उभा ठाके ॥ ६ ॥
मंदिर असावें मलरहित । मंदिर असावें शोभिवंत ।
येणें ध्यासें सेवा घडत । वंदन पहा प्रत्यक्ष ॥ ७ ॥
दर्शन घेतां मंदिरांत । तूं देव मी भक्त ।
ऐसा दास्यभाव उमटत । आपोआप ॥ ८ ॥
आमुचा देव आमुचा धर्म । आमुची याती आमुचा नेम ।
आमुचे म्हणतांच सख्य परम । अंतरीं वसे ॥ ९ ॥
मंदिरीं वसे देवमूर्ति । कैसें स्वरूप कैसी व्याप्ति ।
कैसेनि घडे भगवद्भक्ति । अनन्य जिज्ञासा होतसे ॥ १० ॥
जिज्ञासु करी श्रवण मनन । तेणें निजध्यास चाले गहन ।
निजध्यासें आत्मनिवेदन । नववी भक्ति घडतसे ॥ ११ ॥
असो ऐशा नऊही भक्ति । मंदिरीं साधका सहज घडती ।
याकारनें गुरुमूर्ति । मंदिरें स्थापिती अनेक ॥ १२ ॥
मंदिर खरी धर्म धर्मशाळा । मंदिर उपासका जिव्हाळा ।
मंदिर आनंदाचा मळा । शिणल्या भागल्या जीवासी ॥ १३ ॥
मंदिरीं अन्नदान घडतें । मंदिरीं मैत्री दुणावते ।
संत महंत भेट होते । सहज श्रीमंदिरीं ॥ १४ ॥
देशज्ञान कालज्ञान । नाना तीर्थक्षेत्रांचे ज्ञान ।
येणेंचि रीती समाधान । बहुप्रकारें ॥ १५ ॥
मंदिर बांधितां ससाहित्य । उभय कुळें उद्धरत ।
स्वयें करून करवित । उपासना बहुतांकरवीं ॥ १६ ॥
ऐसीं मंदिरें सद्‌गुरु बांधिती । परिसा जीं उभविली शिष्या हातीं ।
हर्दा येथें बांधविती । रावसाहेब यांचेकरवीं ॥ १७ ॥
महादेवभट्ट इंदुरवासी । पूजा करिती अहर्निशीं ।
शेती पूजासाहित्यासी । दिधली असे ॥ १८ ॥
बेलधडीस ब्रह्मानंद । स्थापिती रामप्रासाद ।
बिदरहळ्ळी व्यंकटापुरीं प्रसिद्ध । मंदिरें बांधिलीं तयांनी ॥ १९ ॥
आनंदसागरें जालनामठीं । स्थापिले श्रीराम जगजेठी ।
यात्रा महोत्सव दाटी । श्रीरामनवमीसी ॥ २० ॥
अंबड येथें दुसरें मंदिर । स्थापना करिती आनंदसागर ।
महोत्सव यात्रा गजर । रामसंप्रदाय वाढविला ॥ २१ ॥
प्रसिद्ध मंदिर पंढरपुरी । जी विठ्ठलाची नगरीं ।
तेथें स्थापिलें कोदंडधारी । पाहतां हारपे तहानभूक ॥ २२ ॥
आप्पासाहेब भडगांवकर । मालक धनिक द्विजवर ।
मंदिर लहान परि सुंदर । नीळकंठबुवा पुजारी ॥ २३ ॥
महाभागवतांचे येथें । शिवालय पूर्वींच होतें ।
मागें स्थापिलें रामातें । हरिहरसंगम शोभतसे ॥ २४ ॥
सिद्धक्षेत्र कुरवली स्थान । तेथें मंदिर बांधिले विस्तीर्ण ।
दामोदरबुवा शिष्य जाण । सुप्रसिद्ध तयांनी ॥ २५ ॥
भाऊसाहेब जवळगीकर । यांजकरवीं श्रीमंदिर ।
बांधविलें शहरीं सोलापूर । उपासना करावया ॥ २६ ॥
तैसेंच मंदिर गिरवीसी । येसूकाकांचे हस्तेंसी ।
पूजा करिती पिलंभट्ट जोशी । श्रीगुरुआज्ञेनें ॥ २७ ॥
नानासाहेब धनिक वदत । विष्णुकाका साधकसंत ।
यांजकरवीं मांडवें येथे । राममंदिर करविलें ॥ २८ ॥
सावळाराम देशपांडे । दंडाधारी नोकर गाढे ।
श्रीमान्‌ भरले द्रव्यघडे । बोधें अनुताप पावले ॥ २९ ॥
तयांकरवीं श्रीराममंदिर । गोमेवाडी येथें सुंदर ।
बांधवोनि केला परिहार । दुष्कृतांचा सत्कर्में ॥ ३० ॥
विष्णु‍अण्णा कात्रे पंत । नोकरी सोडून झाले विरक्त ।
माधुकरी निर्वाह करूनि सतत । भजन करूं लागले ॥ ३१ ॥
दत्तउरपासना तयांनी । घेतली सद्‌गुरुपासोनी ।
दत्तमंदिर आटपाडी बांधोनी । सेवा करिती गुरुआज्ञें ॥३२ ॥
तेथेंचि राममंदिर । स्थापिती बुवा यज्ञेश्वर ।
जे गुरुंचे भक्त थोर । सिद्धपुरुष ॥ ३३ ॥
धनिक साधक गुणराशी । विष्णुपंत म्हासुर्ण्यासी ।
स्थापिती सीतावल्लभासी । गुरुआज्ञा घेउनी ॥ ३४ ॥
विद्वान्‌ शंकरशास्त्री यांसी । श्रींनी नेमिलें पूजेसी ।
सेवा करिती अहर्निशीं । भक्त साधक प्रसिद्ध ॥ ३५ ॥
वामनबुवा पेंढारकर । नामें श्रीगुरुकिंकर ।
मोरगिरी येथें मंदिर । रघुनाथाचें बांधिती ॥ ३६ ॥
करावया पूजोपचार । जगन्नाथ इंदूरकर ।
मदतीस देती गुरुवर । रामसंस्था चालवाया ॥ ३७ ॥
भक्त वासुनाना देव । कृष्णातटीं कर्हााड गांव ।
तेथें पूजिती रामराव । गुरुबोध सेवोनिया ॥ ३८ ॥
मंदिरीं महंत बापू चिवटे । सेवा करिती एकनिष्ठें ।
अतिथीच्या ठायीं ममत्व मोठें । आदरें करिती अन्नदान ॥ ३९ ॥
गणूबुवा रामदासी । कागवाडीं करिती मंदिरासी ।
तेथें मारुतीस्थापनेसी । महाराज करिती आनंदें ॥ ४० ॥
गोविंदशास्त्री पुराणिक । दत्तोपासक भाविक ।
सातारीं दत्तमंदिर देख । बांधिती गुरुआज्ञेनें ॥ ४१ ॥
चिदंबर नाईक करी । हे राममंदिर हुबळी शहरी ।
बांधोन करिती चाकरी । सद्‌गतीकारणें ॥ ४२ ॥
पुणें प्रांती उक्साण । तेथें विठ्ठलमंदिर जाण ।
तैसेंचि नरगुंदीं जीर्णोद्धरण । विठ्ठलमंदिराचें करविलें ॥ ४३ ॥
खातवळीं श्रीविठ्ठलमंदिर । तैसेंचि विखळें येथें सुंदर ।
मांजरड्यास रघुवीर । स्थापिती गुरुआज्ञें ॥ ४४ ॥
संत दप्तरदार विठ्ठलपंत । रसाळ कवित्व जगविख्यात ।
रामोपासक कर्हािडक्षेत्रस्थ । हो‍उनिया गेले ॥ ४५ ॥
त्यांच्या मूर्ति होत्या जरी । पाटण ग्रामीं स्थापविती घरीं ।
बाळकृष्ण महाजन सेवाधिकारी । उपासक श्रीगुरूंचे ॥ ४६ ॥
तैसेंच कोकणप्रांतांत । खेरडी नामक ग्रामांत ।
शेंबेकर वासुदेवाप्रत । आज्ञा जाहली श्रीगुरूंची ॥ ४७ ॥
उत्तम करोनि मंदिर । तेथें स्थापिले रघुवीर ।
सेवाकरिती मनोहर । पूर्व पातकें नाशाया ॥ ४८ ॥सातपुड्यांत राममंदिर । निर्मिलें कैसें परिसा सुंदर ।
एकदां एकले गुरुवर । नर्मदातटीं चालले ॥ ४९ ॥
निबिड घोर कानन । भिल्लांची वसती तेथें गहन ।
पाहतां गुरुनिधान । धांवोन आले दुष्ट ते ॥ ५० ॥
सतेज दिसे भाग्यवंत । वदती भला हा श्रीमंत ।
जवळी जावोन पहात । तंव दिसे गोसावी ॥ ५१ ॥
श्रीगुरु कफनी काढोन । देती अंगावर फेंकून ।
वदती न व्हा उदासीन । ऊर्णावस्त्र मोलाचें । ५२ ॥
क्षण एक घडतांच सत्संगति । तयांसी झाली उपरति ।
सिद्धपुरुष हा निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागले ॥ ५३ ॥
आश्रम पुनीत कराया । कांही फलाहार घ्यावा ।
आम्हांसी प्रसाद द्यावा । म्हणोनियां विनविती ॥ ५४ ॥
तंव वदले श्रीगुरु । ’तुम्ही पातकी वाटमारू ।
तेथें आम्ही प्रसाद करूं । तरी दोष आम्हांसी’ ॥ ५५ ॥
परि आग्रह धरिला त्यांनी । गोठणीं जाती घेवोनी ।
’फळें देती आणोनी । अत्याग्रह मांडिला ॥ ५६ ॥
समर्थ वदती । फळें नको तुमचीं आम्हांसी ।
बहुत दिसती गाईम्हशी । पयःपान कांही करूं’ ॥ ५७ ॥
भिल्ल वदती ’दोहनवेळ । होवोन गेली जी दयाळ ।
रानटी जनावरें ओढाळ । या समयीं दूध न देती’ ॥ ५८ ॥
समर्थ वदती भिल्लांसी । ’ही लठ्ठ दांडगी महिषी ।
दोहन करूं इजसी । पात्र आणा सत्वरीं’ ॥ ५९ ॥
’छे, ही अति बुजरट । मारकी आहे बहु खट ।
तुम्ही न धरा हिची वाट । व्यंग करील देहासी’ ॥ ६० ॥
समर्थ वदती ’तुम्हांस कांहीं । याची चिंता करणें नाहीं’ ।
ऐसे बोलोन लवलाहीं । महीषीसी कुरवाळिले ॥ ६१ ॥
तेव्हां ती स्थिर राहिली । समर्थें तिजसी दोहिली ।
द्विगुणित पात्रें क्षीरें भरलीं । आश्चर्य वाटलें भिल्लांसी ॥ ६२ ॥
वारंवार वंदन करिती । आणि करिती विनंती ।
पावन करा आम्हांप्रति । दुष्टकर्मी आम्ही असों’ ॥ ६३ ॥
समर्थ वदती ’जरी तुम्ही । द्रव्य वेंचाल सत्कर्मीं ।
तरी रामभक्ति शिकवूं आम्हीं । पावन व्हाल सर्वही’ ॥ ६४ ॥
भिल्ल वदती ’सर्वस्व दिलें’ । तेव्हां मंदिर बांधविलें ।
उपासने शिकविलें । अनुग्रह दिला तयांसी ॥ ६५ ॥
असो ऐसे रानटी लोक । भजनीं लावी श्रीसद्‌गुरुनायक ।
येणें परी मंदिरें अनेक । स्थापिते झाले गुरुराव ॥ ६६ ॥
ठायीं ठायीं उपासना । ठायीं ठायीं अन्नदाना ।
तैसीच रामनामस्मरणा । सीमा नाहीं ॥ ६७ ॥
समस्त मंदिरवासी जनां । आज्ञा करी गुरुराणा ।
जेणेंकरून यमयातना । सुटतील बहुतांच्या ॥ ६८ ॥
’मंदिरवासी संतजन । ऐका एक हितवचन ।
अखंड करा नामस्मरण । आणि करवा बहुतांकरवीं ॥ ६९ ॥
अतिथि विन्मुख न दवडावा । तया रामचि मानावा ।
अन्नोदकें तृप्त करावा । यथाशक्ति ॥ ७० ॥
अतिथीचा आदर करणे । हेंचि ब्रीद राखणें ।
शक्ति नसतां मागणें । निःस्पृह भिक्षा ॥ ७१ ॥
कोणा घालों नये संकट । नम्रत्वें असावें धीट ।
रामचरणीं भाव निकट । ठेवितां उणें पडों नेदी ॥ ७२ ॥
भूतीं असावी नम्रता । परनारी तितुकी माता ।
रामनामावांचून वृथा । श्वास जावों देवों नये ॥ ७३ ॥
उषकालीं देह शुद्ध । करोनि आळवा गोविंद ।
सडे रांगोळ्या भूमि शुद्ध । मंदिर सोज्ज्वळ असावें ॥ ७४ ॥
तदनंतर कांकडआरती । भावें ओंवाळा रघुपती ।
समस्तांही द्या जागृती । भूपाळ्या दीर्घस्वरें ॥ ७५ ॥
गणेश शारदा सद्‌गुरु । रामकृष्ण हरिहरु ।
तीर्थें परम योगेश्वरु । करुणस्वरें आळवावें ॥ ७६ ॥
सुगंधी सुमनें आणोनी । हार गुंफा निर्मळ मनीं ।
तुळसीदळें आदिकरूनि । शक्य तितुकें मेळवावें ॥ ७७ ॥
स्नानसंध्या आन्हिक कर्म । करावे आपुले आश्रमधर्म ।
वेदप्रणीत मार्ग दुर्गम । शक्य तितुके साधावे ॥ ७८ ॥
तीर्थोदक पंचामृत । न्हाऊं घाला भगवंत ।
वस्त्रें उपवस्त्रें समस्त । सर्वेश्वर पूजावा ॥ ७९ ॥
धूप दीप निरंजन । नैवेद्य दाखवा षड्रसान्न ।
तांबूल दक्षिणा देवोन । धूपारती करावी ॥ ८० ॥
करावें दासबोधपठण । नित्यनेम समास दोन ।
मनोबोध श्लोक गहन । दीर्घस्वरें म्हणावे ॥ ८१ ॥
इच्छित संख्या नामजप । करावा यथासंकल्प ।
सर्वकाल अजपाजप । करणेंचा अभ्यास असावा ॥ ८२ ॥
रामहृदय नित्यपाठ । सहस्र नामाचा घडघडाट ।
पूजासमयीं वेदपाठ । मंत्रोच्चार करावा ॥ ८३ ॥
पवमान आणि पुरुषसूक्त । पठणें संतोषें रघुनाथ ।
रुद्राभिषेकें वायुसुत । भक्तिभावें पूजावा’ ॥ ८४ ॥
उपासनेचे बहु प्रकार । लिहितां होय विस्तार ।
’साधितां प्रपंचव्यवहार । अध्यात्मविवरण करावें ॥ ८५ ॥
मंदिर म्हणजे सद्धर्मशाळा । बहुत जीवां लावा चाळा ।
दावोन उपासनासोहळा । दुर्बुद्ध सुबुद्ध करावे ॥ ८६ ॥
सायंकाळी करावें भजन । टाळ-वीणा मृदंगवादन ।
लहानथोर मिळवोन । रामभजनीं लावावे ॥ ८७ ॥
अष्टकें सवाया धांवे । धूप दीप नैवेद्य बरवे ।
आरती मंत्रपुष्प अर्पावें । रामरायासी ॥ ८८ ॥
कापूरआरती शेजारती । नित्य करावी रघुपती ।
तैसाचि नमावा मारुती । मंदिरवासी जनांनी’ ॥ ८९ ॥
असो ऐसीं मंदिरें बहुत । बांधविती श्रीगुरुनाथ ।
उपासना वाढविती बहुत । वर्णितां वानी खुंटली ॥ ९० ॥
असो मानसपूजा बहुतांशी । प्रिय असे श्रीगुरूंसी ।
प्रत्यक्षपूजेहूनि मानसपूजेसीं । चित्त होय एकाग्र ॥ ९१ ॥
बहुतांसी साक्षात्कार होती । कांहीं चुकतां खूण देती ।
पुष्पें घालितां परिमळ सुटती । ज्या-त्यापरी प्रत्यक्ष ॥ ९२ ॥
प्रत्यक्ष भेटी झाली । त्याहीपेक्षां मानसपूजेंत भली ।
मानसपूजा न घडतां गुरुमाउली । अंतरसाक्षीची खूण देतसे ॥ ९३ ॥
हा बहुतांसी अनुभव । मानसपूजा शुद्ध भाव ।
नामस्मरणीं गुरुदेव । पावतसे तत्काळ ॥ ९४ ॥
पुढील अध्यायी निरूपण । सद्‌गुरु करिती कथन ।
भक्तिमार्गीं अज्ञजन । कैसे कैसे लाविले ॥ ९५ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ९६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति नवमोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय दहावा
समास पहिला

बहू अज्ञ जीवांप्रती उद्धरीलें । तसें नास्तिकां सत्पथा लावियेलें ॥
समस्तां मुखें नाम हें बोलवीती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १० ॥

श्रीसद्‌गुरु चिन्मयदाता । दोन्ही कर जोडोनी आतां ।
चरणकमलीं ठेवितो माथा । त्रिविधतापें गांजलों ॥ १ ॥
अज्ञान उद्वेग पीडी भारी । शांति झाली पाठमोरी ।
म्हणोन हिंडें दारोदारी । श्रमलो देवा अतिशय ॥ २ ॥
अज्ञानदुःख असे विशद । माजी अनंत पोटभेद ।
करितां तयाचा अनुवाद । लाजिरवाणें मज वाटे ॥ ३ ॥
परि गेलिया वैद्याकडे । न ठेवावें मागेंपुढे ।
तरीच शीघ्र गुण जोडे । भिडेनें व्याधी शमेना ॥ ४ ॥
भीड सांडोन तुमचे द्वारीं । आलों दीन भिकारी ।
परिसा जी आपत्ती सारी । दीनानाथ गुरुमूर्ते ॥ ५ ॥
देहबुद्धि दृढ जाळें । प्रपंच आमिषाचे गोळे ।
टाकोनि धीवरें दुर्धर काळें । ओढूं आरंभिलें ॥ ६ ॥
वासना तस्कर महाथोर । द्वैतसहाय्यीं करी बेजार ।
विवेकीं वृत्ति क्षणभर । नसतां लाग साधिती ॥ ७ ॥
आशेनें कल्पनातरंग । अनंत उठती, वृत्तिभंग ।
होतां दुरावे श्रीरंग । आर्त तेंही पुरेना ॥ ८ ॥
अहंकार पदोपदीं । आडवोन पाडी उपाधी ।
न कळत कार्य साधी । गुपित पाश टाकितसे ॥ ९ ॥
ऐशिया पाशसमुदायीं । जीव अत्यंत कष्टी होई ।
क्षणभरी उसंत नाहीं । जगदृष्टीपुढें ॥ १० ॥
कनक मिळतां मिळेना । मिळतां ओढ शमेना ।
ध्यानीं मनीं तेंचि जाणा । चित्तभंग करितसे ॥ ११ ॥
दारा पुत्र मायपाश । मोहें करिती आपुला दास ।
जगत्पिता जगन्निवास । पारखा झाला ॥ १२ ॥
मोठेपणा सकामकर्म । नीतिव्यवहार कुलधर्म ।
देहव्याधी कष्टी परम । करिती किती आवरावे ॥ १३ ॥
कामक्रोधाचे तडाखे । अधर्माचीं पेरिती विखें ।
ऐसे अज्ञानाचे वाखे । दुःख देती अनिवार ॥ १४ ॥
जीव झाला परम कष्टी । समाधानाची पडली तुटी ।
कोण निवारील संकटीं । शोधूं लागलों ॥ १५ ॥
वेदशास्त्रीं वर्णिकी कीर्ति । आत्मारामीं अखंड शांति ।
परि त्या रामाची वसति । मनबुद्धिसी अगोचर ॥ १६ ॥
जें कल्पनेसी गवसेना । कैसें जावें तया स्थाना ।
काय भाकावी करुणा । तयापुढें ॥ १७ ॥
जो मागे तया न देई । निरिच्छाची पाठ घेई ।
दातेपणाची नवलाई । ऐसी असे ॥ १८ ॥
सगुण निर्गुण द्वैतभाव । संदेही गुंतला जीव ।
तरी कवणापाशीं कींव । भाकावी हें उमगेना ॥ १९ ॥
मागण्याची सोय नाही । आशा तरी धरणें घेई ।
परमार्थी हांसती पाहीं । वेडा अज्ञानी म्हणोनि ॥ २० ॥
भूक कांहीं शमेना । अन्न तेंही मिळेना ।
मागतां बोलती दैन्यवाणा । काय म्हणोनि होतोसी ॥ २१ ॥
असो ऐशी जाहली स्थिती । दोन्हीकडे ही फजिती ।
तंव मार्ग दाविला संतीं । सद्‌गुरुपदाचा ॥ २२ ॥
म्हणोनि आलों धांवत । दाता एक सद्‌गुरुनाथ ।
दातृत्व असे कल्पनातीत । बहुतीं खुणा सांगितल्या ॥ २३ ॥
हें शांतीचें निजघर । वेदांताचें माहेर ।
वासनाक्षय सपरिवार । गुरुपदीं मुळींहून ॥ २४ ॥
सुख येई वसतीसी । ठाव नसे द्वैतासी ।
याचकांच्या आर्तिराशी । विरोन जाती ॥ २५ ॥
प्रपंच परमार्थ दोन्हीकडे । छत्र चालिलें रोकडें ।
सदा हें महाद्वार उघडें । धन्य देणगी गुरुकृपा ॥ २६ ॥
चरणीं घातलें । दंडवत । आतां चिंता नको व्यर्थ ।
पदरीं घेतील समर्थ । बाळचिंता मायेसी ॥ २७ ॥
ऐसी ही गुरुमाउली । बहुतांलागीं पान्हावली ।
अष्टमाध्यायीं कथिली । आणिक पुढती अवधारा ॥ २८ ॥
त्रिविध प्रकृति बोलती । तैसे मानव अनंतजाती ।
अज्ञ नास्तिक वेदांती । हठनिग्रही कितियेक ॥ २९ ॥
कोणी व्याधिग्रस्त झाले । कोणा भूतें पछाडिलें ।
कोणी उन्मादें भरले । निंदा करिती गुरूची ॥ ३० ॥
नररूपें श्रीमारुती । अवतरली गुरुमूर्ति ।
त्याहीवरी सिद्धस्थिति । उच्चसाधनें मिळविली ॥ ३१ ॥
ऐशियांची होतां भेटी । तापत्रयांच्या सुटती गांठी ।
समाधान पाठीपोटीं । रामभक्ति वाढविती ॥ ३२ ॥
नित्य घडती चमत्कार । लिहितां ग्रंथ होय विस्तार ।
विवरण करूं थोडेंफार । कथानुसंधानें ॥ ३३ ॥
इंदुरीं असतां गुरुमाय । अनंत धरिती चरणसोय ।
चुकविती बहुत अपाय । गुरुसेवा करूनी ॥ ३४ ॥
साधु ऐसी पसरली कीर्ति । कोणी एक अधिकारी मंदमति ।
अधिकारमदें उन्मत्तवृत्ति । आला श्रींसन्निध ॥ ३५ ॥
उपहासित भाविकांसी । ढोंगी वदत समर्थांसी ।
सद्‌गुरु हांसती तयासी । अहंकारी म्हणोनी ॥ ३६ ॥
तेव्हां तया क्रोध आला । अद्वातद्वा बडबडला ।
परम शांति देखोन झाला । मानसीं चकित ॥ ३७ ॥
मग वदे समर्थांसी । ’तुम्ही साधु म्हणविता आपणासी ।
जरी भविष्य संगाल मजसी । तरीच हें सत्य मानूं’ ॥ ३८ ॥
महाराज वदती तयालागून । ’आम्ही गोसावी अज्ञान ।
रामावांचोन आन । भविष्य न ये आम्हांसी ॥ ३९ ॥
परि तुमची पुरवील आर्त । गोदू ही भगवद्भ्क्त ।
परिसा स्थिर करोनि चित्त । अहंकार सांडोनी’ ॥ ४० ॥दहा वर्षांची बालिका । गुरुकृपें वदली देखा ।
जन समस्त पाहती कौतुका । गुरुमाहात्म्य अगाध ॥ ४१ ॥
’आजपासोन आठवे दिनीं । तुझीं बालकें मरतील दोन्ही ।
आणि पंधरा दिवसांनीं । कांता तुझे मरेल ॥ ४२ ॥
जयाकारणें उन्मत्त झालासी । तो अधिकारही जाईल विलयासी ।
तदुपरि श्रीचरणासी । धरशील पश्चात्तापें’ ॥ ४३ ॥
सहज लीलें वदली गोष्ट । राम मनीं खोंचला धीट ।
वरिवरि हास्य करोनि विकट । निघोन गेला ॥ ४४ ॥
तंव आठां दिवसांनी । ओहळीं वाहोन दोन्ही ।
बालकें गेलीं मरोनी । स्त्री बुडाली विहिरींत ॥ ४५ ॥
लांचेचा आळ आला । अधिकार्यां चा रोष झाला ।
मग पश्चात्तपें पोळला । श्रीचरणीं मिठी घाली ॥ ४६ ॥
तारीं तारीं गुरुराया । अहंकारें वाहवलो वायां ।
आतां मुख हें दडवाया । ठाव देईं तव पदीं ॥ ४७ ॥
तूं दीनांची माउली । तूंचि शांतेची साउली ।
उपेक्षा न करीं वहिली । तरणोपाव सांगावा’ ॥ ४८ ॥
श्रीगुरु वदती तयासी । ’प्रारब्धभोग जीवासी ।
न चुके जाण निश्चयेंसी । दोष नाही तुम्हांकडे ॥ ४९ ॥
होणर तें होवोनि गेलें । आतां स्मरा रामपा‍उलें ।
सांकडें निवारील सगळे । नोकरी स्थिर होईल’ ॥ ५० ॥
गुरुवचनीं धरिला विश्वास । नाम घेई रात्रंदिवस ।
आळ जाऊन निःशेष । योग्यता वाढली ॥ ५१ ॥
महाराजांची जाहली ख्याती । ही प्रत्यक्ष देवमूर्ती ।
अघटित करणी करिती । रामभक्त आगळे ॥ ५२ ॥
तेथेंचि आणिक एक प्रकार । घडला तो करूं विस्तार ।
चित्त करूनिया स्थिर । श्रवण करावें ॥ ५३ ॥
गुरुकथा बहु गोड । सेवितां दवडी विषयाची चाड ।
पूर्वसंचित असतां जाड । श्रवणीं पडे ॥ ५४ ॥
गुरुकथा वर्णायासी । बुद्धि नसे आम्हांसी ।
वंदूनि तयांचे चरणांसी । बोलविती तें बोलतसें ॥ ५५ ॥
गुरुभक्त झाले फार । नित्य करिती नामगजर ।
हातीं स्मरणी घेऊनि सार । जप करिती नामाचा ॥ ५६ ॥
त्यांत विप्र होते बहुत । रामनाम जपती नित्य ।
कर्माभिमानी कांहीं पंडित । तयांसी हें नावडे ॥ ५७ ॥
’आम्ही वेदाधिकारी ब्राह्मण । सदा करावें वेदाधयन ।
शूद्रें करावें नामस्मरण । उचित नसे आपणांसी ॥ ५८ ॥
आम्ही त्रिवर्णांसी पूज्य । आम्ही ज्ञानी उपजत सहज ।
भूलोकीं देव द्विज । वदती तें पहावें’ ॥ ५९ ॥
शिष्य वदती तयांलागून । ’ज्ञानी तुम्ही अतिगहन ।
ज्ञानचिन्हें करा कथन । शब्दज्ञान सांडोनी ॥ ६० ॥
कामक्रोध अहंकार । हें तो तुमचे माहेरघर ।
वैराग्य नसे तिळभर । अन्नार्थें वेदविक्रय करितां ॥ ६१ ॥
वंचकवृत्ती धरोनी । वदतां आम्ही बहु ज्ञानी ।
ऐसीच वदली वेद वाणी । सांगा कीं आम्हांसी ॥ ६२ ॥
वेदपुरुष नारायण । तो जयासी प्रसन्न ।
तो पूज्य सकलांलागुन । हें सांगणें नलगे ॥ ६३ ॥
वेद वंद्य आम्हांसी । परि पात्रता पाहिजे पठणासी ।
आहारविहार नियमांसी । अतिशुद्धता ॥ ६४ ॥
तरीच मंत्र सामर्थ्य चाले । ज्ञान होईल शुद्ध भलें ।
परि सांप्रत युग आलें । कैसें पहा ॥ ६५ ॥
शक्य तितुकें करावें । सुलभ नाम जपत जावें’ ।
ऐसें कथिलें गुरुदेवें । ’नाम प्रिय देवासी ॥ ६६ ॥
नामें घडे भगवद्भदक्ति । नामें होय ज्ञानप्राप्ती ।
नामें जोडे सायुज्यमुक्ति । संतसज्जन सांगती ॥ ६७ ॥
वेदारंभीं हरिनाम । कलींत साधन हेंचि परम ।
सुगम असोन दुर्गम । भगवत्पदीं नेतसे’ ॥ ६८ ॥
परि तें नायकतीच कोणी । उपहासिती तयांलागोनी ।
शास्त्री होते तोफखानीं । ते करिती बहु निंदा ॥ ६९ ॥
एकदां राममंदिरांत । महाराज आले दर्शनार्थ ।
शास्त्रियांस कळली मात । धांवोन आले ते ठायीं ॥ ७० ॥
’तुम्ही भ्रष्टविले ब्राह्मण । उपदेशितां नामस्मरण’ ।
अहंकारें भरीं भरोन । ऐसीं दुरुत्तरें बोलती ॥ ७१ ॥
समर्थ वदती ’नामप्रताप । कळेल तुम्हां आपेंआप ।
उगाच न करावा संताप । मज अज्ञानियावरी’ ॥ ७२ ॥
’ऐसे पाहिले बहुत’ । म्हणोनि गेले गृहांत ।
तंव गुरुमहिमेची मात । श्रोतेजनीं परिसावी ॥ ७३ ॥
एक प्रहर राहतां निशीं । वेड लागलें शास्त्रीयांसी ।
घेवोन जळके काष्ठासी । गृहांतूनि निघाले ॥ ७४ ॥
काष्ठाची करुनी टिपरी । मुखीं नाम उच्चारी ।
हिंडतसे गांवभरी । शुद्धि नाहीं ॥ ७५ ॥
धरोनि खालीं बैसवितां । हात तोंड नये आवरितां ।
यासी काय करावें आतां । भूतें कीं झडपिलें ॥ ७६ ॥
परि हे वदती राम राम । हा साधुनिंदेचा दोष परम ।
शोधीत आले आराम । ब्रह्मचैतन्य महाराज ॥ ७७ ॥
चरणी आणोन घातले । करुणा भाकों लागले ।
कृपासागर श्री द्रवले । मस्तकीं हस्त ठेविला ॥ ७८ ॥
सहज लागली समाधि । हारपल्या आधिव्याधि ।
मग येवोनि शुद्धि । वंदन करी क्षणक्षणा ॥ ७९ ॥
अनुग्रह दीक्षा दिली । निंदकावर कृपा केली ।
नामसत्ता दाविली । समस्तांसी ॥ ८० ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय दहावा
समास दुसरा

जयजय श्रीरघुराया । अज्ञानें जिणें होय वाया ।
शरणागता दर्शन द्याया । विलंब कासया लाविला ॥ १ ॥
गोंदवल्यास असतां गुरुवर । भाऊसाहेब जवळगेकर ।
करोडगिरीचे नाक्यावर । होते श्रीमान्‌ परि रोगग्रस्त ॥ २ ॥
पोटीं पुत्रसंतान नाहीं । म्हणोनि चिंता करिती पाही ।
भार्या सती गंगाबाई । समर्थचरणीं विश्वास ॥ ३ ॥
उभयतां आले गोंदवल्यासी । सद्‌भावें पूजोनि गुरूंसी ।
कथन करिती मनोव्यथेसी । उपाय पुसती ते काळी ॥ ४ ॥
’देहव्याधीने गांजलो । संतान नाहीं म्हणोन भ्रमलों ।
संपत्ति असोन मुकलों । संसारसुखासी ॥ ५ ॥
रात्रंदिन वाहे चिंता । तव पदीं ठेविला माथा ।
आतां तारिता आणि मारिता । तूंचि एक दीनबंधु’ ॥ ६ ॥
ऐसी करिती विनंती । सद्‌गुरु शुद्ध भाव पाहती ।
’कृपा करील रघुपती । चिंता कांही न करावी ॥ ७ ॥
येथेंचि रहावें उभयतांनीं । रामप्रसाद सेवोनी ।
सर्वकाळ वागवा स्मरणी । श्रीरामनामाची ॥ ८ ॥
तोचि निवारील सर्व व्यथा । पुत्र होईल, नको चिंता ।
रामचरणीं विश्वासतां । उणें नाहीं भक्तासी’ ॥ ९ ॥
उभयतां मनीं संतोषले । गुरुवचनी विश्वासले ।
सेवा करित राहिले । महाराजांची सद्‌भावें ॥ १० ॥
प्रातःकालीं उठोन । मंदिरीं सडासंमार्जन ।
कांकड आरती करोन । पूजा करिती आनंदे ॥ ११ ॥
पंचारती ओवाळिती । चरणतीर्थ आदरें घेती ।
सदा मुखें नाम वदती । प्रसाद ही महौषधि ॥ १२ ॥
जो सदा राहे पथ्यावरी । तो मंदिरीं खाता बाजरी ।
रोग गेला देशांतरीं । गुरुकृपा अगाध ॥ १३ ॥
पांडुरता मावाळली । शरीरकांती सतेज झाली ।
कांता गरोदर राहिली । सेवाकरितां भक्तीनें ॥ १४ ॥
यथाकालें पुत्र झाला । परि उलटे पायाचा जन्मला ।
सद्‌गुरु वदती तयाला । ’दुरित शेष अद्यापि ॥ १५ ॥
आणखी करा नामजप’ । नेमून दिले नित्य माप ।
’पाय सरळ होतील सरतां पाप । रामप्रसादेंकरोनि’ ॥ १६ ॥
करितां करितां रामसेवा । मुलगा सरळ झाला तेव्हां ।
मग आनंद काय सांगावा । स्तुति करिती परोपरी ॥ १७ ॥
’तूं देवांचाहि देव । आम्हां भेटलासी गुरुराव ।
निरसिले रोग चिंता सर्व । कृपें सद्‌गुरु तुमचेनि ॥ १८ ॥
नाही ज्ञान नाही भक्ति । नाहीं साधनसंपत्ति ।
अज्ञानियां धरोनि हातीं । सुमार्गासी लाविलें ॥ १९ ॥
निरोप देती उभयतांसी । ’विसरूं नका श्रीरामासी ।
इहलोकीं नांदाल सुखेंसी । अंतीं सद्‌गति पावाल’ ॥ २० ॥
गुरुआज्ञा घेवोन गेले । ऐसें बहुतांस तारिलें ।
पुढें श्रीगुरु जगदुद्धारा निघाले । यात्रामिष करोनि ॥ २१ ॥
आम्ही यात्रेसी जाणार । ऐसें वदतां गुरुवर ।
शिष्य समुदाय निघाला फार । पुरुष स्त्रिया बालकें ॥ २२ ॥
समर्थगृही दास कुबेर । तेथें उणें काय पडणार ।
समुदाय निघाला अपार । रामनाम गर्जत ॥ २३ ॥
शके अठराशें सत्ताविशीं । सद्‌गुरु आले प्रयागासी ।
वर्षाऋतु श्रावणमासीं । समुदायासमवेत ॥ २४ ॥
तीर्थकृत्यें सकल करोन । करावया वेणीदान ।
नौकेमाजी आरोहण । करिते झाले ते समयीं ॥ २५ ॥
मध्यभागीं नौका गेली । तों जलें तुडुंब भरली ।
आणि भोंवर्यांलत सांपडली । अकस्मात्‌ जीर्णनौका ॥ २६ ॥
मग गलबलां कोण पुसतां । जीव प्रिय सर्वां भूतां ।
हाहाःकर उडाला सर्वथा । उभय थडी लोक दाटले ॥ २७ ॥
पाणी अपरंपार भरलें । मानवी उपाय न चाले ।
पाहते बुडते घाबरले । काय दशा म्हणती हे ॥ २८ ॥
श्रीगुरूंची अखंड शांति । सकल लोकां शांतविती ।
म्हणती तारील रघुपति । भजन करा स्वस्थचित्तें’ ॥ २९ ॥
पवित्र्यावरी उभे ठेले । आणि भजन आरंभिलें ।
सकलही करूं लागले । उसनें अवसान धरोनि ॥ ३० ॥
सुखासनीं गप्पा मारितां । बहुत दाविती समर्थता ।
प्रसंगें कसोटी लागतां । टिके ऐसा विरळा संत ॥ ३१ ॥
भजनाचा करितां गजर । तत्क्षणीं नौका झाली स्थिर ।
लोक पाहती चमत्कार । धन्य साधु म्हणती हे । ३२ ॥
श्रीगुरु वदती नाविकांसी । दुजी नौका आणा वेगेंसी ।
चिंता न करावी मानसीं । समर्थ आमुचा पाठिराखा ॥ ३३ ॥
दुजी नाव येईपर्यंत । ही नाव भोवरी असोन स्थित ।
लोक पहात तटस्थ । उभय थडी ॥ ३४ ॥
दुजी नांव येतां तेथ । एक पद ठेविती त्यांत ।
चला म्हणती समस्त । हळूं हळूं एक एक ॥ ३५ ॥
समस्त माणसें आलीं । ऐसें त्रिवार पुसोनि गुरुमाउली ।
चरण उचलितांच गेली । फुटकी नौका वाहत ॥ ३६ ॥
चरणीं लागतां अनंत तरलीं । मग नौका कशी बुडेल भली ।
करणी करोनि दाविली । प्रत्यक्ष सद्‌गुरुरायें ॥ ३७ ॥
सकळांसी आनंद झाला । नामगजर बहु केला ।
गौरकायी थवा लोटला । किल्ल्यावरूनि दर्शना ॥ ३८ ॥
कडेस येतां गुरुमूर्ति । नारीनर आरत्या करिती ।
कोणी पुष्पमाळा घालिती । किणी करिती दंडवत ॥ ३९ ॥
निंदकां मनीं पस्ताव झाला । गौरकायी म्हणती साधु भला ।
देवसुत पुन्हां अवतरला । म्हणोन टाळी देताती ॥ ४० ॥
तंव इकडे काय झालें । ग्रामाधिकारी क्षोभले ।
उपाध्यायासी धरोन नेलें । किल्ल्यावरी तयांनीं ॥ ४१ ॥
’जरी नौका फुटकी होती । तरी त्वां हांकारिली कशा रीतीं ।
गुन्हा घडला तुझे हातीं । आतां शिक्षा भोगावी ॥४२ ॥त्या उपाध्यायाचा सुत । महाराजांसी प्रार्थित ।
’धरोन नेमा मम तात । निरसावे संकट हें ॥ ४३ ॥
अजाणपणें घडला व्यापार । हें जाणती गुरुवर ।
कृपा करोनि दीनावर । तारी आम्हां गुरुराया’ ॥ ४४ ॥
अभय देऊनि तयासी । सोडवलें उपाध्यायासी ।
मिरवणूक काढिली खाशी । कुरवंड्या करोनि सुवासिनी ॥ ४५ ॥
दानधर्म केला बहुत । गोप्रदानें सालंकृत ।
शिष्य झाले अपरिमित । उत्तरदेशीं ॥ ४६ ॥
पूर्वीं एकदां काशीस गेले । ते समयीं अभिनव घडलें ।
महामारीनें त्रासले । जन सर्व ॥ ४७ ॥
किती पडती कितीक मरती । कोणा न मिळे मूठमाती ।
महाराज चालिल्या मार्गावरती । एक भिकारीण मृत दिसे ॥ ४८ ॥
तियेचें तान्हे मूल । रडोनि करी गोंधळ ।
स्तनपाना उतावेळ । परि दूध न येई ॥ ४९ ॥
पाहोन त्या बालकाची स्थिति । दयार्द्र झाली गुरुमूर्ति ।
म्हणती ’काय झाले माउलिप्रति । हांका मारोनि पाहावें’ ॥ ५० ॥
शिष्य सांगती ते काळीं । ’हीं तों असे मृत झाली’ ।
सद्‌गुरु वदती ’झीट आली । रामतीर्थ आणावें’ ॥ ५१ ॥
तीर्थ शिंपडोन अंगावरी । बोलले ’माउली सावध हो सत्वरीं ।
बालका घेवोन अंकावरी । स्तनपान दे वेगें ॥ ५२ ॥
ऐसें वदतां गुरुमाउली । निर्जीव तनु सजीव झाली ।
लोक पाहतां पदर सांवरी । बालका घेत कडेवरी ॥ ५३ ॥
विस्मय वाटे सकळांसी । धन्य साधु तेजोराशी ।
मानवी कृति नव्हे ऐसी । म्हणोनि चरणीं लोळती ॥ ५४ ॥
घटीं मठीं चैतन्य भरलें । हें तों बाणोनिया गेलें ।
चैतन्यदृष्टी पाहतां आलें । अचेतनासी चतन ॥ ५५ ॥
असो उपाधि होईल बहुत । म्हणोन निघाले त्वतिर ।
उद्धरिती अनंत भक्त । रामनाम बोधोनि ॥ ५६ ॥
साठये उपनामें न्यायाधीश । अधिकारी सात्त्विक विशेष ।
श्रीमान्‌ परि भोगिती त्रास । पोटशूलव्यथेचा ॥ ५७ ॥
चैन नसे दिननिशीं । सदा पाळिती पथ्यासी ।
औषधी देशी विदेशी । घेतां गुण न वाटे ॥ ५८ ॥
उपाय करोनि थकले । व्यथा अणुभरी न ढळे ।
तंव भाग्योदयें भेटले । ब्रह्मचैतन्य सद्‌गुरु ॥ ५९ ॥
श्रींच्या आशीर्वचनीं । व्याधि हरली मुळींहूनि ।
जैसा उदय होतां दिनमणि । अंधकार लया जाय ॥ ६० ॥
येणेंपरी गोंदवल्यासी । असतां करणी केली कैसी ।
चिंतामणभट्ट द्विजासी । उदरव्यथा अतिशय ॥ ६१ ॥
कर्नाटकीं वसति ज्याची । उदरव्यथा बहु जाची ।
वाटे आहुति प्राणांची । घेईल आतां निश्चयें ॥ ६२ ॥
क्वचित्काळी स्वल्प अन्न । क्वचित्काळी पयःपान ।
दुःख भोगी रात्रंदिन । म्हणे प्राण जातां बरें ॥ ६३ ॥
उपाय करितां करितां थकले । दिवसेंदिवस व्याधि प्रबळे ।
तंव अकस्मात्‌ श्रवणीं पडलें । ब्रह्मचैतन्यचरित्र ॥ ६४ ॥
महासाधु गोंदवलेकर । केवळ ईश्वरी अवतार ।
करावया जगदुद्धार । मर्त्यलोकीं अवरतले ॥ ६५ ॥
व्याधिग्रस्त बहुत येती । गुरुप्रसादें मुक्त होती ।
तुम्हीं जावें शीघ्रगति । व्याधि हरण करतील ॥ ६६ ॥
परिसोनिया ऐसी वाणी । वाटे अमृत पडलें श्रवनीं ।
सत्वर निघाला तेथोनी । गुरुभुवना पावला ॥ ६७ ॥
कोणी समाराधना होती केली । भोजनपात्रें सिद्ध झालीं ।
तंव भट्टजींची स्वारी आली । दर्शन घ्यावया श्रीगुरूंचें ॥ ६८ ॥
समर्थ वदती विप्रांसी । ’बैसा सत्वर भोजनासी’ ।
विप्र वदे विनयेसी । ’अन्न वैरी आमुचें ॥ ६९ ॥
अन्नाविणें प्राण जाती । अन्न खातां तीच गति ।
आठां दिवसांउपरांतीं । स्वल्प आहार सेवितों ॥ ७० ॥
ते दिनीं अहोरात्र । शूल उदरीं सर्वत्र ।
ओखटें माझें प्रारब्धसूत्र । दयासिंधो गुरुराया’ ॥ ७१ ॥
श्रीगुरु वदती ते समयीं । ’रामप्रसादा दोष नाही ।
भिती सांडोन लवलाहीं । सेवन करा मिष्टान्नें’ ॥ ७२ ॥
भीत भीत पात्रावरी । बैसला द्विज ते अवसरीं ।
म्हणे साधुसन्निध मरतां बरी । गति तरी मिळेल’ ॥ ७३ ॥
बहुतां दिसांचा भुकेला । अत्याग्रहें तृप्त केला ।
तधींपासोन शूल गेला । धन्य कृपा श्रीगुरूंची ॥ ७४ ॥
मोरगिरीचे भक्तजन । श्रीसन्निध येवोन ।
विनविती प्रेमेंकरोन । रामस्थापनें चलावें ॥ ७५ ॥
बहुत दिवस विनवितां । कृपा उपजली गुरुनाथा ।
जावोन स्थापिलें रघुनाथा । आनंदोत्सव बहु झाला ॥ ७६ ॥
भक्त नेती घरोघरीं । गुरुपूजा परोपरी ।
करोनि मस्तक चरणावरी । अघनाशना ठेविती ॥ ७७ ॥
गुरुंची कीर्ति परिसोनी । समंधग्रस्त शिंपीण जनी ।
येतां मुक्त करिती झणीं । सद्‌गुरु दयाळ ॥ ७८ ॥
ऐसा अनंत व्याधींस । गुरुकृपामृतरस ।
मिळतां होय विनाश । भाग्यवंता लाभतसे ॥ ७९ ॥
साधकांसी बोधामृत । वेळोवेळां सद्‌गुरु देत ।
त्यांचीं नामें श्रोते संत । परिसावीं एकचित्तें ॥ ८० ॥
अमृतघुटका मुख्य जाण । परमार्थ न होण्याचें कारण ।
निस्पृहसमास शिकवण । अभंगवचनें अनेक ॥ ८१ ॥
आचारविचार स्त्रीधर्म । साधकां बाधक कलिधर्म ।
याचेंहि कथिती वर्म । करुणासागर गुरुमूर्ति ॥ ८२ ॥
मुख्य सार स्वधर्माचरण । जतन करोनि नामस्मरण ।
करावें अघनाशन । स्वस्वरूपा पावावया ॥ ८३ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय दहावा
समास तिसरा

मागें तुकाई अनुग्रह पावोनि । इंदुरीं आली गुरुजननी ।
तेव्हां तपस्तेज पाहोनि । तेथें अनेक भक्त जाहले ॥ १ ॥
जिजाबाई नामें भक्त । कैसी झाली पदांकित ।
त्याचा इतिहास तुम्ही संत । श्रोतेजनीं परिसावा ॥ २ ॥
जिजाबाईचा पति । लागला गुरुभजनाप्रति ।
जिजा म्हणे भोंदू असती । कलियुगीं बहुतेक ॥ ३ ॥
पाहोनि याची परिक्षा । उतरूं साधुत्वाचा नक्षा ।
मनीं धरूनि ऐसी आकांक्षा । वरिवरी सेवा करी ॥ ४ ॥
एकदां भोजनां बैसविलें । पति नाहींसें पाहिलें ।
सत्त्व पाहूं ये वेळे । साधुत्व कसा लावोनि ॥ ५ ॥
ऐसा मनीं विकल्प केला । मिरच्या कुटून लाडू वळला ।
पात्रीं आणोन घातला । दुरून पाहे कौतुक ॥ ६ ॥
स्वस्थपणें भक्षण केला । म्हणती आणिक लाडू घाला’ ।
पुनरपिही भक्षिला । हा हा हू हू होईना ॥ ७ ॥
मनीं म्हणे हा धूर्त । रानींवनीं असे भ्रमत ।
उपास घडतां असेल खात । भगवती क्वचित्काळी’ ॥ ८ ॥
निखारे काढिले रखरखीत । पात्री आणोनि घालत ।
सद्‌गुरु सहजानंदांत । तेहि खाऊं लागले ॥ ९ ॥
पाहोन झाली घाबरी । धांवोनिया चरण धरी ।
’अज्ञानी मी तारी तारीं । कृपाळुवा गुरुराया ॥ १० ॥
स्त्रीबुद्धि अविचार । घडला जी दयासागर ।
पतीसी कळतां समाचार । गति बरवी मज नाहीं ॥ ११ ॥
ढोंगी बहु जगांत । मिरविती म्हणोनि संत ।
याकारणें अनुचित । कर्म घडलें स्वामिया ॥ १२ ॥
साधूसी घालोनि निखारे । केलें सुकृताचें मातेरें ।
यमदूत छळतील सारे । दुष्ट पातकी म्हणोनी ॥ १३ ॥
इहपर दुःखाच्या राशी । दिसों लागल्या अविनाशी ।
आतां मज गति कैसी । सांग सांग सर्वज्ञा ॥ १४ ॥
अज्ञानी मी चांडाळीण । उपजतांच जातें मरोन ।
तरी साधुद्वेषदोष गहन । टळला असता आजिंचा ॥ १५ ॥
आतां जी दयासागरा । दोषार्णवीं मज तारा ।
तुम्हांवांचोनि आसरा । दुजा नसे त्रिभुवनीं’ ॥ १६ ॥
स्फुंदफुंदोनिया रडे । दंडप्राय चरणीं पडे ।
दयासागर म्हणती ’वेडे । वृथा शोक न करावा ॥ १७ ॥
अनुताप उपजला पोटीं । तेव्हां दोष गेले पाठीं ।
अभय देतो मी शेवटीं । सत्वर शोक आवरीं’ ॥ १८ ॥
हस्तें धरोनि उठविली । मृदुवचनें शांत केली ।
तधींपासोन लीन झाली । एकनिष्ठ सेवा करी ॥ १९ ॥
जिजाबाईचा पती । तैसी जिजा माउली सती ।
कन्या ताई सुमती । सेवा करिती श्रीगुरूंची ॥ २० ॥
कांही काळ त्यांचेजवळ । वास्तव्य करिती गुरुदयाळ ।
सेवोनि बोधामृतकवळ । ज्ञान झालें तिघांसी ॥ २१ ॥
एकदा कुंभारयोगी कोणी । साधनीं अडले म्हणोनि ।
आशंका काढिती लिहोनी । प्रश्न पुसती बहुतांसी ॥ २२ ॥
बहुत साधु शोधिले । परि समाधान नच झालें ।
तवं कोणी वर्तमान कथिलें । ब्रह्मचैतन्य सद्‌गुरूंचें ॥ २३ ॥
तेव्हां आला धांवत । जिजाईचे गृहाप्रत ।
तंव मंचकीं देखिले समर्थ । चरण चुरित जिजा ताई ॥ २४ ॥
दुरून पाहतां म्हणे कांही । येथें साधुत्वाचें लक्षण नाहीं ।
स्त्रिया चरण चुरिती पाही । योगिया मुळीं विघातक ॥ २५ ॥
ऐसें मनीं आणोनि । निघता झाला तेथोनि ।
तंव श्रीसमर्थांनी । ताईकडोन बोलाविला ॥ २६ ॥
’अहो श्रेष्ठ योगिराज । आलां होतां कवण काज ।
प्रश्न काढा पाहूं’ सहज । हास्यमुखें बोलती ॥ २७ ॥
मनींचा भाव जाणला । हें पाहोन योगी दचकला ।
कागद काढोन पुढे केला । चरण वंदी तें समयीं ॥ २८ ॥
ताईनें वाचला कागद । अठरा प्रश्नांचा अनुवाद ।
म्हणे ’सद्‌गुरुप्रसाद । होतां प्रश्न सुटतील ॥ २९ ॥
आज्ञा होईल मजला जर । उत्तरें देईन सत्वर’ ।
विनोदें वदती गुरुवर । ’पोरबुद्धी कायसी ॥ ३० ॥
योगी साधक असती भले । बहुत देश शोधित आले ।
महान्‌ महान्‌ जेथें थकले । तेथें तूं काय वदशील ॥ ३१ ॥
परि इच्छा असे तुजसी । तरी तूंच बोल वेगेंसी’ ।
आज्ञा होतांच ताईसी । उत्तरें बोलूं लागली ॥ ३२ ॥
एकामागोन एक प्रश्न । सोडवून करी समाधान ।
योगी आनंदित होवोन । चरण धरित ताईचे ॥ ३३ ॥
श्रींचे चरणी नमोनि । म्हणे ’धन्य साधुशोरिमणि ।
मानवाची नव्हे करणी । सत्यस्वरूप दावावें ॥ ३४ ॥
धनय तुमचा प्रसाद । लहान बालिका बोले विशद ।
जो थोरथोरांसी अनुवाद । करितां समाधान होईना ॥ ३५ ॥
साच नोहे मानवकरणी’ । म्हणोनि लागला चरणीं ।
सत्यस्वरूप दावा झणीं । पायीं घट्ट मारी मिठी ॥ ३६ ॥
हातीं धरून उठविला । हनुमंतस्वरूप तयाला ।
दावोन योगी धन्य केला । समर्थ सद्‌गुरूंनी ॥ ३७ ॥
योगी म्हणे माझे मनीं । विकल्प आला होता क्षणीं ।
संगतीं स्त्रिया पाहोनि । क्षमा करणें स्वामिया ॥ ३८ ॥
अग्निकाष्ठें भक्षण करी । संगतीं राहोन निर्विकारी ।
ऐसा तूं ब्रह्मचारी । दर्शनें पुनीत जाहलों ॥ ३९ ॥ ऐशी स्तुति करी बहुत । वरचेवरी चरण धरित ।
अनुतापें जाहला तप्त । योगभ्रष्ट होता जो ॥ ४० ॥
विकल्पें योगभ्रष्ट केला । तया बोधें शांतविला ।
पुनरपि साधनें मुक्त झाला । धन्य धन्य गुरुकृपा ॥ ४१ ॥
ते काळीं गुरुवर । एकांतप्रिय होते फार ।
क्वचित्‌ प्रसाद कोणावर । पूर्वभाग्यें होतसे ॥ ४२ ॥
राजयोग जेव्हां धरिला । तेव्हां लोकीं प्रकट झाला ।
प्रसाद बहुतां लाधला । त्यांतील कांही अवधारा ॥ ४३ ॥
सांगली येथें सरकारी । डांक खात्याचे अधिकारी ।
गृहस्थ होते सदाचारी । परि कट्टे शिवभक्त ॥ ४४ ॥
विष्णुपंत नगरकर । नामें असती द्विजवर ।
करोनिया घरदार । गृहस्थाश्रमीं राहती ॥ ४५ ॥
विष्णुभक्तांची निंदा भारी । करिती नानापरोपरी ।
वैष्णव तितुके त्यांचे वैरी । कृष्णलीला निंदिती ॥ ४६ ॥
नित्य करिती पार्थिवपूजन । सदा ध्याती उमारमण ।
शिवभक्ति करिती गहन । परि हरीसी निंदिती ॥ ४७ ॥
महाथोर शिवभक्त । परि न्यूनभाव द्वैत ।
जाणोनिया सद्‌गुरुनाथ । कृपादृष्टीं पाहती ॥ ४८ ॥
एकदां तया दृष्टांत झाला । स्वप्नीं पूजेसी बैसला ।
शिवालयीं शंकराला । पूजितसे प्रेमानें ॥ ४९ ॥
तंव अकस्मात लिंगामागोनी । प्रगट झाली गुरुजननी ।
गृहस्थ पाहे दचकोनी । म्हणे कोण सिद्धपुरुष ॥ ५० ॥
चहूंकडे फांकली प्रभा । दिव्यपुरुष सिद्ध उभा ।
कीं हा परमानंदाचा गाभा । रामदासी भासतेसे ॥ ५१ ॥
पायी खडावा रत्नचजडित । कंठी तुळशीमाला शोभत ।
मुद्रा रामनामांकित । पाहतसे प्रेमानें ॥ ५२ ॥
कफनी फरगुल घातला । भाळीं त्रिपुंड शोभला ।
मस्तकीं जरीकांठ जिला । मखमली टोपी शोभतसे ॥ ५३ ॥
हातीं स्मरणी तुळशीची । झोळी नवविधभक्तीची ।
कुबडी श्रीसमर्थांची । ’रघुवीर समर्थ’ गर्जती ॥ ५४ ॥
विप्र उभा कर जोडोनि । समर्थ वदती तयालागोनी ।
’तुम्ही शिवभक्त तपोज्ञानी । परि हरीसी निंदितां ॥ ५५ ॥
हरिहरां भेद नाहीं । श्रुतिस्मृति कथिती पाहीं ।
आजपासोन प्रत्यहीं । शालिग्रामही पूजावा ॥ ५६ ॥
विष्णूचें करितां पूजन । शिव होईल सुप्रसन्न ।
येविषयीं संशयी मन । पुनरपि ठेवूं नये’ ॥ ५७ ॥
’हां जी’ म्हणोनि म्हणितले । अंगी रोमांच थरारले ।
नेत्रीं आनंदाश्रु भरले । मुखीं शब्द फुटेना ॥ ५८ ॥
संत पूजावे आरते । देव सारावे परते ।
अभंगवाक्य तयातें । आठवलें ते काळीं ॥ ५९ ॥
तेंचि साहित्य घेवोनि । पूजिले साधुशिरोमणि ।
’पुनः भेट होईल; म्हणोनि । गुप्त झाले दयासिंधु ॥ ६० ॥
विप्र जागृतीस आला । सकळां दृष्टांत निवेदिला ।
शालिग्राम पूजूं लागला । तेव्हांपासोनि ॥ ६१ ॥
परि अंतरीं सिद्धध्यान । लागलें सदा अनुसंधान ।
पुनरपि देईन दर्शन । हें वाक्य चिंतीतसे ॥ ६२ ॥
सिद्ध साधु येतां कोणी । दर्शना जाई धांवोनि ।
नाना क्षेत्रांसी पाहोनि । स्वप्नींचें ध्यान धुंडितसे ॥ ६३ ॥
कांही केल्या आढळेना । तळमळ लागली मना ।
सकळां सांगोनि खाणाखुणा । पुसे ऐसा साधु पाहिला कीं ॥ ६४ ॥
तंव कोणी तया कथिलें । पंढरीसी म्यां पाहिले ।
गोंदवलेकर महाराज भले । राममंदिरीं वास करिती ॥ ६५ ॥
शीघ्र गाडींत बैसला । पढरीक्षेत्रीं पावला ।
विठ्ठलचरणीं लोळला । सद्‌गुरु भेटवीं म्हणोनि ॥ ६६ ॥
शोधिलें राममंदिर । देखिलें नयनीं गुरुवर ।
आनंदाचा भरला पूर । मज दीना वर्णवेना ॥ ६७ ॥
तेंचि रूप पाहतां नयनीं । चरण न्हाणिले अश्रूंनी ।
प्रेमें हस्तें कुरवाळोनि । बोलती झाली गुरुमाय ॥ ६८ ॥
महाथोर शिवभक्त । शिवासी आवडते अत्यंत ।
कलियुगीं ऐसें संत । भेटती विरळा ॥ ६९ ॥
’शालीग्राम पूजितां कीं नाहीं । कां विसरलां स्वप्नसमयीं ।
शिव विष्णु एकचि पाहीं । त्रिकाल सत्य मानावें ॥ ७० ॥
जे शिवासी निंदिती । ते हरीसी नावडती ।
तैसे विष्णूसी निंदिती । तेहा नावडती शिवा’ ॥ ७१ ॥
असो अनुग्रहप्रसाद देवोन । केलें तयाचें समाधान ।
शिव विष्णु हे अभिन्न । सांगती सकळांसी ॥ ७२ ॥
जेथें राममंदिरें बांधलीं । तेथें शिवालयें स्थापिलीं ।
सिद्धारूढांची भेटी झाली । ते समयीं तेंचि कथिती ॥ ७३ ॥
कर्नाटकीं हुबळीं शहरी । सिद्धारूढ सिद्धस्वारी ।
एकदा समर्थांची फेरी । जाहली तया स्थानासी ॥ ७४ ॥
समर्थशिष्य रामनाम । गर्जती उच्चस्वरें परम ।
सिद्धशिष्य शिवनाम । गर्जती ते समयासी ॥ ७५ ॥
दोघे उपदेशिती सकळांसी । भेद नसे हरिहरांसी ।
दोन्ही नेत्रीं एका वस्तूसे । पाहतां भिन्न दिसेना ॥ ७६ ॥
असो ऐसी गुरुमाउली । बहुतांप्रति लाभली ।
महद्‌भाग्यें फळासी आलीं । ते ते पुनीत जाले ॥ ७७ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय दहावा
समास चवथा

शिवविष्णु अभेदस्थिति । सकलां सांगे गुरुमूर्ति ।
आतां परिसावी जी श्रोतीं । सुरस कथा ॥ १ ॥
एके समयीं कुच्ची ग्रामासी । समर्थ शिष्यगृहासी ।
गेले पाहोन भक्तीसीं । महोत्साह चालिला ॥ २ ॥
यात्रा भरली विशेष । भक्त धांवती दर्शनास ।
प्रसाद होतसे बहुवस । अनुग्रह देती बहुतांसी ॥ ३ ॥
आपत्तीनें पीडले जन । काकुळती येती धांवोन ।
समर्थांसी निवेदन । करिती भावभक्तीनें ॥ ४ ॥
ऐसा चालिला थाट । महान्‌ साधु म्हणती बोभाट ।
नास्तिकांचें कर्णकपाट । फोडोनि आंत दुमदुमला ॥ ५ ॥
तंव तेथे कृष्णाजीपंत । असती उपनामें भागवत ।
तयांसी कळली मात । भगवद्‌भक्त हे म्हणोनि ॥ ६ ॥
मनीं म्हणती या युगांत । एकहि नसे अनन्य भक्त ।
धूर्त भोंदू हे सत्य । भाविकांसी ठकविती ॥ ७ ॥
तरी पाहूं यांची स्थिति । कैसें ज्ञान कैसी भक्ति ।
कैसी साधनसंपत्ति । कैसे जन वेधिती ते ॥ ८ ॥
कौतुक पाहती दुरून । सकल करिती पूजन ।
नानापरी नैवेद्य देवोन । चरणतीर्थ आदरें घेती ॥ ९ ॥
भाविक उच्छिष्ट सेविती । मायबहिणी न्हाऊं घालिती ।
नीरांजनें आरत्या करिती । साहेबमेळा सभोंवार ॥ १० ॥
पीकपात्र धरिलें कोणी । छाया करिती छत्र धरूनि ।
कोणी खडावा घेऊनि । मस्तकीं धरिती भक्तीनें ॥ ११ ॥
दर्शना येती बहुत जन । प्रपंचगार्हाकणी करिती कथन ।
जपावांचोन परमार्थलक्षण । एकहि तया दिसेना ॥ १२ ॥
अंतर जाणती शहाणे । उगाच पाहती दैन्यवाणे ।
भाविक अंधभक्तीनें । उपासने लागती ॥ १३ ॥
शाब्दिक पाहती व्युत्पन्न । नास्तिकां साक्षात्कार जाण ।
दुबळे वैभव देखोन । भुलोनि नादीं मागती ॥ १४ ॥
परिक्षकांच्या ऐशा जाती । भागवत धूर्ततेनें पाहती ।
अंतर जाणण्या नसे शक्ति । सिद्धानेंचि सिद्ध उमजावे ॥ १५ ॥
म्हणती येथें वैराग्यलक्षण । कांहींच न दिसे मज लागून ।
मंत्र तंत्र वशीकरण । कांहीं तरी असेल ॥ १६ ॥
म्हणोनि पुढें सरसावले । समर्थांसी बोलूं लागले ।
’धूर्तपणें जन भुलविले । वैभव इच्छा धरोन ॥ १७ ॥
गोड खाऊन देह मातला । दोन उंटां भार झाला ।
उगाच भोंदतां जनाला । साधू साधू म्हणोनी ॥ १८ ॥
काय आहे तुमचेपाशीं । दाखवावे सत्वर मजसी ।
नाहीं तरी ह्या ढोंगासी । सोडून द्यावे’ ॥ १९ ॥
परिक्षावंत जाणोन । सद्‌गुरूंसी समाधान ।
म्हणती हा विवेकी ब्राह्मण । यावरी कृपादृष्टी करावी ॥ २० ॥
समर्थ वदती पंतांसी । ’दावितां काय द्याल मजसी’ ।
पंत वदती ’चरणांसी । अर्पिन देह आपुल्या’ ॥ २१ ॥
उभयतांचा संवाद झाला । परि संशयो नाही गेला ।
दुजे दिनीं पाचारिला । शिष्याकरवीं तयासी ॥ २२ ॥
परि तयाचें कपाळ । उठलें होतें ते वेळ ।
सद्‌गुरु समर्थ दयाळ । वदती ’यावे तैसेचि’ ॥ २३ ॥
हो ना करीत उठोन आला । सद्‌गुरूंनी हस्त फिरविला ।
मस्तकाचा शूळ गेला । तत्क्षणीं लयासी ॥ २४ ॥
’तुम्ही विवेकी परिक्षाकर्ते । आमुचे बहु आवडते’ ।
महाराज वदती तयांते । ’राहिलें कीं ना मस्तक’ ।
पंत म्हणती श्रीगुरूंसी । ’येणें नव्हे समाधानासी ।
मंत्र असेल तुम्हांपाशीं । साधुसत्ता नव्हे ही’ ॥ २६ ॥
समर्थ वदती तयांप्रती । ’साधुसत्ता कैसी असती ।
सांगा तुम्ही आम्हांप्रति । विवेकी ज्ञानी पंत हो’ ॥ २७ ॥
ऐसा करितां विनोद । बहुत जाहला संवाद ।
नाहीं झालें चित्त शुद्ध । विकल्प कांही जाईना ॥ २८ ॥
तंव समर्थें उग्र रूप धरिलें । इतरां सौम्यचि भासलें ।
परि संत अति भ्याले । पळोन गेले ओहोळीं ॥ २९ ॥
समर्थ वदती शिष्यांसी । ’काय झाले भागवतांसी ।
धरोनि आणा मजपाशीं । समजाविशी करोनी’ ॥ ३० ॥
शिष्य निघाले त्वरित । ’अहो थांबा भागवत ।
हांक मारिती सद्‌गुरुनाथ । क्षण एक स्थिर रहावे’ ॥ ३१ ॥
भागवत म्हणती ’नमस्कार । प्रत्यक्ष मारुति‍अवतार ।
मजला न होय धीर । समर्थांपुढे यावया’ ॥ ३२ ॥
भीत भीत पुढें आले । तेथें सौम्य रूप पाहिले ।
शरीर चरणीं लोटिलें । अष्टभाव दाटोनी ॥ ३३ ॥
’आपण साक्षात्‌ हनुमंत । अज्ञानें मी झालो भ्रांत ।
तारीं तारीं श्रीगुरुनाथ । देह सेवेसी अर्पिला’ ॥ ३४ ॥
अनुग्रहप्रसाद देवोनी । वदती ’रहा सुखें सदनीं ।
अखंड नाम स्मरतां मनीं । आमुची सेवा घडेल ॥ ३५ ॥
रामनाम ज्यांचे चित्तीं । तेथें नित्य आमुची वसति ।
वियोग न माना कल्पांतीं । सत्य प्रत्यय येईल’ ॥ ३६ ॥
असो भागवतां मारुतिदर्शन । देऊनि केलें समाधान ।
तैसेंचि श्रीरामदर्शन । बाळकोबांसी करविलें ॥ ३७ ॥
श्रोते वदती ती कथा । कैसी केली सार्थकता ।
सविस्तर सांगोन चित्ता । तोषया जी आमुच्या ॥ ३८ ॥
गुरुकथामृतपान । करोनि तोषविलें मन ।
परि आणिकहि हे श्रवण । भुकेले असती ॥ ३९ ॥
वक्ता बोले जी उत्तर । कृपा करील गुरुवर ।
क्षण रहावें स्थिर । गुरुपदचिंतनीं ॥ ४० ॥
बाळकोबा परिचारक नाम । सदाचारी सात्विकोत्तम ।
श्रीगुरूंचे भक्त परम । ज्वराव्याधीनें ग्रासिले ॥ ४१ ॥सप्तदिनपर्यंत । तयांसी नव्हतें बोलवत ।
अंतसमय झाला प्राप्त । श्रीगुरूंनी जाणिले ॥ ४१ ॥
जवळी जावोनि कुरवाळिती । सत्वर उठवोनि बैसविती ।
रामतीर्थ तयांप्रती । दिधले श्रींनी स्वहस्तें ॥ ४३ ॥
तंव तो शुद्धीस आला । वंदन करी गुरुपदाला ।
दीनवाणी विनविता झाला । ’कृपा करा मजवरी ॥ ४४ ॥
अंतसमय महाकठिण । जननदुःख तयाहून ।
फिरफिरोन भागला प्राण । तरी आतां उद्धरावें’ ॥ ४५ ॥
श्रीगुरूंनी ते अवसरी । हस्त ठेविला मस्तकावरी ।
ग्रंथिभेद होवोन उपरीं । रामदर्शन करविलें ॥ ४६ ॥
रामनाम घेत मुखीं । शीघ्र गेला वैकुंठलोकीं ।
देह ठेविला गुरुपादुकीं । धन्य भाग्य तयाचें ॥ ४७ ॥
ऐसी गुरुकृपा गहन । तैसेंचि नाममाहात्म्य पूर्ण ।
दावोन सकळांलागोन । ध्यास लाविला नामाचा ॥ ४८ ॥
निळकंठबुवा कर्नाटकी । जेव्हां चालिले स्वर्गलोकीं ।
ओठ बोटें एकसारखीं । पूर्वाभ्यासें हालत होतीं । ४९ ॥
देहीं नसतां चेतना । तरी ही चालिली चालना ।
अभ्यासयोग ऐसा जाणा । त्याहीवरी गुरुकृपा ॥ ५० ॥
अखंड नाम स्मरावें । ऐसें कथिती सकलां ठावें ।
कोणीएकें पुसिलें कैसें व्हावें । निद्रेमाजीं खंड पडे ॥ ५१ ॥
सद्‌गुरु नेती तयासी । अखंड नामधारीयापाशी ।
निद्रिस्त असते समयासी । म्हणती नाम ऐकावें ॥ ५२ ॥
देहासी लावितां कान । सूक्ष्म होय नामस्मरण ।
वदती दृढ आपण जाण । खंड कधींही पडेना ॥ ५३ ॥
खंडेराव म्हैसाळकर । देसाई कोणी इनामदार ।
परि रक्तपितीचा आजार । अतिदुःख देतसे ॥ ५४ ॥
तंव परिसिलीं कीर्ति । सद्‌गुरुब्रह्मचैतन्यमूर्ति ।
गोंदवले ग्रामीं वास करिती । निवारतील व्याधीसी ॥ ५५ ॥
परिसतां कीर्ति ऐसी । दर्शना आले गोंदवल्यासी ।
विनंती करिती गुरूपाशीं । व्याधी पीडा अनिवार ॥ ५६ ॥
तयां करवीं नामजप । करोनि निरसिलें पाप ।
ऐसे बहुतांचे ताप । हरविले किती सांगूं ॥ ५६ ॥
आप्पासाहेब पटवर्धन । वीरवंशज शीलवान ।
कागवाड जगदंबाभुवन । राजे पूर्वील तेथींचे ॥ ५८ ॥
कागवाडकर रामदासी । नेती तयां दर्शनाप्रती ।
रामनगरी अयोध्येसी । होते जेव्हां समर्थ ॥ ५९ ॥
अनुग्रहप्रसाद देवोन । सुखी केले धनवान ।
कृपादृष्टीं पाहोन । स्वग्रामा पाठविलें ॥ ६० ॥
पूर्वसंचित कुलशाप । बहुत होता यतिताप ।
सत्त्व रुजतां तम पाप । प्रगट होऊं लागलें ॥ ६१ ॥
देहस्मृति उडाली । निद्रा शांति समूळ गेली ।
माय चरणीं नेवोन घाली । श्रीगुरुदत्तांचे ॥ ६२ ॥
श्रीनृसिंहवाडी क्षेत्रीं । सेवा करिती दिनरात्रीं ।
दृष्टांत देती सुत-अत्रि । तुम्हां तारक गुरुमाय ॥ ६३ ॥
मग गोंदवलेंसी आणविलें । श्रींचे चरणीं घातलें ।
तुमचें बालक तुम्हीं वहिलें । मारावे वा तारावें ॥ ६४ ॥
समर्थ वदती ते समयीं । रामभक्तां भय नाहीं ।
नामजपा लावोन पाहीं । समंधरोष शांतविला ॥ ६५ ॥
ब्रह्मद्वेष अतिकठिण । त्यावरी यति साधक गहन ।
शांत होतां होतां जाण । वरचेवरी उद्‌भवे ॥ ६६ ॥
पुनरपि सेवितां चरण । वासना जाय विरोन ।
सत्संगतीं पापक्षालन । होवोनि झाले सत्त्वस्थ ॥ ६७ ॥
आतां श्रीगुरु त्रिकालज्ञ । येविषयीं दृष्टांत जाण ।
सांगोनि हा ध्याय पूर्ण । करूं, बहु विस्तारला ॥ ६८ ॥
मठीं त्रिगुणी लोक येती । कांहीं तस्करबुद्धि असती ।
दुर्लभ वस्तु छपविती । दुजयाची ठकवोनी ॥ ६९ ॥
कागाळी जाय समर्थांपुढें । नेमके जाती चोरांकडे ।
वदती ’हें काय करतां वेडे । राजदंड पावाल ॥ ७० ॥
वस्तु द्यावी आम्हापाशीं । आम्ही सांगूं न कोणासी ।
यापुढें ऐसे दुर्गुणासी । सोडून द्यावें’ ॥ ७१ ॥
नेमकीचि सांगती खूण । आणि बोध करिती गहन ।
बहुतांचे दवडिती दुर्गुण । पुण्यक्षेत्रीं गुरु पाहीं ॥ ७२ ॥
कामुकांची तीच गति । सद्‌गुरुतपस्तेजपुढतीं ।
बुद्धीस होय उपरति । संतसंगमाहात्म्य ॥ ७३ ॥
सहस्रावधि स्त्रीपुरुष । नांदती गुरुछायेस ।
रीघ नसे दुर्बुद्धीस । शिराया तपस्तेजें ॥ ७४ ॥
नेमकाचि सांगती जप । नेमकें दर्शविती पाप ।
नेमकेचि कथिती संकल्प । या त्रिविध जगासी ॥ ७५ ॥
परि कोणाचा अपमान । कधींही न करिती जाण ।
ज्याची त्यासी सांगोन खूण । सुमार्गासी लाविती ॥ ७६ ॥
ऐशा असती बहु कथा । नित्य घडती कोण गणिता ।
परमार्थीं वळवाया चित्ता । फक्त दिशा दाविली ॥ ७७ ॥
तपस्तेज अति गाढें । न पाहावें मुखाकडे ।
नास्तिकांचेंही मस्तक पडे । नम्र होवोनि गुरुपदीं ॥ ७८ ॥
हठयोगी कर्मयोगी । वेदांतवादी विरागी ।
प्रयत्न प्रारब्धवादी जगीं । नाना पंथ नाना ध्येयें ॥ ७९ ॥
नित्य येती गुरूंपाशी । निंदा स्तुति करावयासी ।
कांही आशंका पुसणेंसी । गुरुधामीं धांवत ॥ ८० ॥
नाना आशंका फेडोन । सकळांचें करिती समाधान ।
गुरुमाय सदा प्रसन्न । भाविकां नास्तिकांसी ॥ ८१ ॥
आत्माराम हृदयीं धरावा । आणि विश्वात्मा ओढोनि घ्यावा ।
ये विषयीं हा दाखला पहावा । सद्‌गुरुलीलेमाझारीं ॥ ८२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय दहावा
समास पाचवा

ॐ नमो जी विश्वंभरा । विश्वचालका विश्वेश्वरा ।
भक्तालागी अभयकारा । विराट्पुरुषा नमोऽस्तु ते ॥ १ ॥
एकदां श्रीगुरूंची स्वारी । भैय्यासह पादचारी ।
फिरत असतां नर्मादातीरीं । गिरिगव्हरीं प्रवेशले ॥ २ ॥
तृषा लागली म्हणोनी । गुहेमाजीं गेले झणीं ।
तेथें निर्मल जल पाहोनी । प्राशन करूं लागले ॥ ३ ॥
तेथें एक सतेज योगी । बैसले होते अंतर्भागीं ।
ते समाधी उतरोनि वेगीं । बाह्यप्रदेशीं पातले ॥ ४ ॥
पुसती ’रामवतार झाला कीं नाहीं । दर्शना जाऊं लवलाही ।
ही इच्छा धरोनि पाहीं । समाधि लावोनि बैसलों’ ॥ ५ ॥
सद्‌गुरु वदती योगियासी । ’रामकृष्ण अवतारांसी ।
होवोनि सांप्रत कलीसी । प्रारंभही झालासे’ ॥ ६ ॥
ऐसी परसोन वाणी । कष्टी झाला वृद्ध मुनि ।
जाणोनि हे श्रीगुरूंनीं । मस्तकीं हात ठेविला ।
ज्ञानोदयें चरण वंदोनी । प्राण सोडिते झाले मुनि ।
अग्निसंस्कार तयां करोनी । उभयतां झाले मार्गस्थ ॥ ८ ॥
भय्यासाहेब करिती प्रश्न । ’हें काय आश्चर्य गहन’ ।
सद्‌गुरु वदती हास्यवदन । ’योगिया गति मिळाली ॥ ९ ॥
बहुतां दिसांचा तापसी । लावोन बैसला समाधीसी ।
वंचना करित काळासी । सद्‌गतीकारणें ॥ १० ॥
राम दर्शन करोनि । जावें मुक्त होवोनी ।
ऐसी इच्छा धरोनी । प्राणापान कोंडिले ॥ ११ ॥
तो काल निघोन गेला । योगी तैसाचि राहिला ।
आजिं भाग्य उदयाला । येतां गेला वैकुंठीं’ ॥ १२ ॥
असो योगिया गति दिली । ऐसें बहुत कार्यें केली ।
दयाळ सद्‌गुरुमाउली । भेटली आम्हां सभाग्यां ॥ १३ ॥
नीलकंठ दामोदर जोशी । जे कुरुंदवाडचे रहिवासी ।
त्यांचे करविती विवाहासी । तो प्रकार परिसावा ॥ १४ ॥
विजापूरप्रांतींची कोणी । विप्रस्त्री कन्या घेवोनी ।
आली गोंदवलें श्रीभुवनीं । समर्थचरण वंदितसे ॥ १५ ॥
कन्या घालोन पदकमलीं । विनंती करी ते वेळीं ।
रोगें बहुत ही ग्रासली । नायटे उठती सर्वांगी ॥ १६ ॥
अमावस्ये मावळती । पौर्णिमे पुन्हा चिघळती ।
ऐसी बहुत दिवसांचे स्थिति । गति बरवी दिसेना’ ॥ १७ ॥
म्हणोन घातली चरणावरी । ’कृपा करा दीनावरी ।
तुम्ही दीनांचे कैवारी । ऐसी कीर्ति जगांत’ ॥ १८ ॥
समर्थ वदती ’अहो माय । सांकडे निरसील रामराय ।
परि एक असे उपाय । मानेल तरी करावा ॥ १९ ॥
कन्या देतां गरिबासी । रोगमुक्त होय खाशी ।
घेवोन पतिअनुज्ञेसी । करा निश्चय सत्वर’ ॥ २० ॥
तत्काळचि पत्र लिहिलें । होकारार्थीं उत्तर आलें ।
रामसाक्षी उदक सोडविलें । कन्या देऊं गरिबासी ॥ २१ ॥
सती वदे समर्थांसी । ’कोणा देऊं सांगा मजसी ।
विवाहमुहूर्त समयासी । कन्यादान करूं तया ॥ २२ ॥
ते समयीं दर्शनाकरितां । नीळकंठ तेथें उभा होता ।
समर्थ वदती ’उदर भरतां । काय धंदा करोनी’ ॥ २३ ॥
नीळकंठ वदे ’भिक्षेसी । नित्य फिरवितों झोळीसी’ ।
समर्थ वदती सतीसी । ’यासी द्या हो कुमारिका’ ॥ २४ ॥
’आज्ञा प्रमाण’ तिनें म्हटलें । एकमेकीं पत्ते पुसिले ।
बालिकेचें दुःख हरले । कृपावचनें सद्‌गुरूंच्या ॥ २५ ॥
कांही दिवसां‍उपरी । पिता मनीं विचारी ।
’कन्या सुस्वरूप गोजिरी । कैसी द्यावी भिक्षुका ॥ २६ ॥
आम्ही गृहस्थ धनवंत । जांवई आम्हां न शोभत’ ।
भाक विसरला समस्त । कन्यामोहें करोनी ॥ २७ ॥
विकल्प येतां मनां । पुनरपि उठले नायटे बहुत ।
मग शीघ्र कन्यदान करीत । कुरुंदवाडी जावोनी ॥ २८ ॥
असो समर्थकृपेंकरोन । उभयतांचें झालें कल्याण ।
तैसेचि अनंत जन । गुरुकृपें आनंदले ॥ २९ ॥
भवानराव नामेंकरोन । भक्त भावसंपन्न ।
तयांस संकटीं दर्शन । वाराणसीं जाहलें ॥ ३० ॥
हर्द्यासी असतां गुरुवर । काशीस निघाले सपरिवार ।
भवानराव भक्त थोर । संगें येऊं विनविती ॥ ३१ ॥
समर्थ वदती तयांसी । ’तुम्ही रहावें मठासी ।
आम्ही आलियावरी काशीसी । स्वतंत्र तुम्ही चलावें’ ॥ ३२ ॥
समर्थ काशीस जावोन येतां । भवानराव निघाले यात्रेकरितां ।
दरकूच जातां जातां । काशीक्षेत्री पावले ॥ ३३ ॥
तेथें वदती भटासी । ’एकांत स्थळ आम्हांसी ।
जप करीत रहावयासी । द्यावें तुम्ही उत्तम’ ॥ ३४ ॥
एक ओसाड घर असे भलें । जें समंधपीडें दूषित झालें ।
तें नामधारकासी दिधलें । काय होतें पाहती ॥ ३५ ॥
समर्थशिष्या कोठेंही । कळिकाळाचें भय नाहीं ।
पिशाच काय करील पाहीं । प्रकार घडला तो पहावा ॥ ३६ ॥
कांहीं काल तया स्थानीं । भवानराव होते जप करोनी ।
मध्यरात्रीं एके दिनीं । समंध तेथें प्रगटला ॥ ३७ ॥
शुभ्रवस्त्र परिधान । मिठाईचा पुडा देवोन ।
बोलतसे हास्यवदन । जपून हा ठेवावा ।
भावानराव नामधारक । पाठीं समर्थ सहायक ।
न डगला अणु एक । पुडा ठेवोन घेतला ॥ ३९ ॥
कांही वेळ गेल्यावरी । पुन्हां आली समंधफेरी ।
कृष्णवस्त्र परिधान करी । मिठाई मागों लागला ॥ ४० ॥
भवानराव वदले तयासी । ’शुभ्र प्रावरणें असती ज्यासी ।
तेणें दिधला मजपाशी । तुजला नाहीं देणार’ ॥ ४१ ॥
उभयतांचा तंटा झाला । उन्मत्त समंध उरीं बैसला ।
भवानरावें धांवा केला । सद्‌गुरुमहाराजांचा ॥ ४२ ॥
तंव तेथें अभिनव घडलें । लख्ख प्रकाशें अंबर भरलें ।
गुरुमहाराज प्रगटले । समंध गेला पळोनी ॥ ४३ ॥
शिष्या अभय देवोनी । गुप्त झाली गुरुजननी ।
पुन्हां तेथें समंधानें । मुख नाही दाखविलें ॥ ४४ ॥
सत्ताधारी गुरुमूर्ति । शिष्यसंकटी उभे असती ।
हर्द्यासी असोनि काशीप्रति । शिष्यसंकटीं प्रगटले ॥ ४५ ॥
पिशाचमोचन केलें फार । गणती कोण करणार ।
परि कांहींसा प्रकार । दृष्टांतासी वर्णन करूं ॥ ४६ ॥
रघुनाथराव फडणवीस । जतसंस्थानी करिती वास ।
परि समंधव्याधी भार्येस । तेणें दुःख भोगिती ॥ ४७ ॥
उभयतां आले गोंदवलीं । समर्थसेवा बहु केली ।
बारा समंधां गति दिली । माणगंगाप्रवाहीं ॥ ४८ ॥
फडणवीसही उदासीन । झाले होते अति गहन ।
तयांस लावोन साधन । दुःख हरलें उभयतांचें ॥ ४९ ॥ आतपाडीकर पिलाजीपंत । देशपांडे नामें विख्यात ।
तयांचेही भार्येप्रत । लागले सात समंध ॥ ५० ॥
तयांसीही दिधली गति । ऐसे प्रकार नित्य घडती ।
कांही कथिले तुम्हांप्रति । गुरुसत्ता कळावया ॥ ५१ ॥
गोविंदराव केळकर । भार्या सरस्वती चतुर ।
परि समंध पीडा फार । मोरगिरीवासिया ॥ ५२ ॥
येवोन लागती चरणासी । श्रीगुरु वदविती समंधासी ।
ब्रह्मचारी उच्चारी वेदासी । परि गायत्री अर्धचि म्हणे ॥ ५३ ॥
’साग्र गायत्री म्हणेन । तरी भस्मचि होईन’ ।
ऐसें वदे तें दावोन । समर्थ बोधिती शिष्यांसी ॥ ५४ ॥
गायत्रीचा महिमा ऐसा । ज्ञानरूप तेजोमय ठसा ।
परि सांप्रत निरर्थक कसा । द्विजांलागी भासतसे ॥ ५५ ॥
असो पिशाचयोनींतूनि । शीघ्र तयासी काढोनी ।
गति दिधली समर्थांनी । संतदर्शन होतसे ॥ ५७ ॥
गुरुसत्ता आहे किती । तैसी स्वरूपाची व्याप्ती ।
पहावी कांहीं दृष्टांतीं । कथन करूं गुरुलीला ॥ ५८ ॥
कृष्णराव तरडे म्हणोनी । कोणी भक्त श्रीसदनीं ।
एकदां जातां आडरानीं । भुजंग आला आडवा ॥ ५९ ॥
राव बहु घाबरला । तंव सर्प जवळीच आला ।
मग श्रींची शपथ तयाला । घालितां राहिला तेथेंचि ॥ ६० ॥
हलूं नको जागचा येथ । म्हणोनि घातली तया शपथ ।
येवोनि गुरूंसी सांगत । सर्पा भ्यालों म्हणोनी ॥ ६१ ॥
समर्थ वदती जा सत्वरी । दुरूनि शपथ मोकळी करीं ।
जाईल बिचारा आपुले घरी । बंधन कोणा नसावें ॥ ६२ ॥
जावोन पाहती मंडळी । सर्प स्थिर त्या स्थळीं ।
तरडे वदतां जा स्वस्थळीं । तेव्हांची दूर पळाला ॥ ६३ ॥
बाळकृष्णभट्ट नामें जोशी । पुत्रविणें बहुक्लेशी ।
चार केल्याही स्त्रियांसी । पुत्र नाहीं जाहला ॥ ६४ ॥
चौथी स्त्री उपवर । होवोनि गेलें संवत्सर- ।
त्रयोदश, परि आशांकुर । लोभें नाहीं मावळला ॥ ६५ ॥
करुणा भाकी श्रींचे चरणीं । निपुत्रिक अभागी म्हणोनि ।
श्रीगुरु वदती कोदंडपाणी । संकटसमयीं स्मरावा ॥ ६६ ॥
औटकोट जप करितां । पुत्र प्रसवली द्विजकांता ।
आनंद न समाये चित्ता । वारंवार स्तवन करी ॥ ६७ ॥
महाराज असतां सोलापुरी । आला एक चितारी ।
विनवी घ्यावी प्रतिमा बरी । इच्छा पुरवा समर्था ॥ ६८ ॥
श्रीगुरु वदले तयासी । द्रव्य मेळवूं इच्छिसी ।
तरी आज या समयासी । न काढितां बरें ॥ ६९ ॥
परि आग्रह साहेबीं धरिला । बहुतां येईल दर्शनाला ।
सद्‌गुरूही विनोदें बोला । तुकविती मान ॥ ७० ॥
श्रींसी आसनीं बैसविलें । दोहींकडे साहेब भले ।
हस्त जोडोन उभे ठेले । यंत्री घेतली प्रतिछाया ॥ ७१ ॥
तंव तेथें अघटित घडले । साहेब मात्र व्यक्त दिसले ।
महाराज गुप्त झाले । अवघे करिती विस्मय ॥ ७२ ॥
चितारी ओशाळला बहुत । पाहोन दयाळू समर्थ ।
दुजे दिनीं काढों देत । सुप्रसन्न वदनानें ॥ ७३ ॥
बहुतीं प्रतिमा काढिल्या । तितुक्या भिन्न आल्या ।
बहुरूपी सद्‌गुरु भला । लीला करोन दाखवी ॥ ७४ ॥
मार्तंडबुवा नामें एक । औंध ग्रामींचा श्रीसेवक ।
हरिदास हास्यविनोदादिक । कीर्तन करी रसाळ ॥ ७५ ॥
श्रीगुरुप्रसादेंकरोन । सुत झाला तयालागोन ।
तोही करी कीर्तन । अल्पवयीं गुरुकृपें ॥ ७६ ॥
शंकरशास्त्री म्हासुर्णेकर । गुरुचरणीं भाव थोर ।
एकदां करिती विचार । स्तवन करावें श्रीगुरूंचें ॥ ७७ ॥
परि कवित्वाची शक्ति । नाहीं म्हणून काकुलती ।
गुरुचरणांसी प्रार्थिती । कांही सेवा घडावी ॥ ७८ ॥
ऐसें मनीं भाविलें । तें श्रींनीं ओळखिलें ।
शिष्यकोड पुरविलें । तो प्रकार परिसावा ॥ ७९ ॥
रात्रौ तयांस स्वप्नांत । एकाएकी स्फुर्ति होत ।
सहा श्लोक रचोनि स्तवित । असतां आले जागृती ॥ ८० ॥
तंव श्लोक स्मरणीं खासे । लिहोन ठेविती जैसे तैसे ।
परि अष्टक करावें ऐसें । वाटतां आणिक दोन केले ॥ ८१ ॥
प्रसंगें दावितां गुरूंसी । खूण दिधली तयांसी ।
शेवटचें दों श्लोकांसी । फाडोनियां टाकिलें ॥ ८२ ॥
प्रासादिक आणि पाठक । कवित्वा भेद आत्यंतिक ।
हाही दाविला विवेक । श्लोकार्थातें विवरितां ॥ ८३ ॥
मोरगिरीनजिक कोकिसरें गांवीं । वार्ता घडली परिसावी ।
गर्भिणी अडली ती मुक्त व्हावी । बहुतीं केले उपाय ॥ ८४ ॥
शूद्रस्त्री संकटीं पडतां । हरि पाटलासी आली ममता ।
अंगारा लावोन नवस करितां । सुटका करिती श्रीगुरु ॥ ८५ ॥
आनंदें मोरगिरीस येवोनी । प्रेमें नमिला कोदंडपाणी ।
मठपतीसी विनवोनी । नवस पूर्ण करितसे ॥ ८६ ॥
पांडवसंख्या मुद्रिकांस । त्वरित पाठविल्या गोंदवलेंस ।
आनंदें श्रीचरणांस । वारंवार स्तवितसे ॥ ८७ ॥
कोणा नवसे पुत्र होती । कोणाच्या व्याधी हरती ।
अनंत नवसांसी पावती । द्यावे किती दृष्टांत ॥ ८८ ॥
सांगलीस एक भाविक सती । श्रीगुरुपदांकित होती ।
अवचित तिचे पुत्रावरती । राजक्षोभ जाहला ॥ ८९ ॥
धरोनि नेती अधिकारी । माय शोक करी भारी ।
दृढ विश्वास गुरुवरी । म्हणोन संकट घातलें ॥ ९० ॥
देव्हारींच्या गुरुपादुका । काढोन ठेवी जळीं देखा ।
निरपराधी सुताची सुटका । व्हावी ऐसें प्रार्थितसे ॥ ९१ ॥
इकडे गोंदावलेंसीं श्रीचरण । सुजले न कळे कारण ।
अनेक उपाय करकरोन । पाहतां गुण येईना ॥ ९२ ॥
समर्थ वदती शिष्यांसी । न करावे उपाय यासी ।
कांहीं कालें आपैंसी । सूज लया जाईल ॥ ९३ ॥
इकडे खटला चालूं झाला । पुत्र निर्दोष ठरला ।
तेव्हां काढोन पादुकांला । समाराधना करितसे ॥ ९४ ॥
तंव सूज उतरोन गेली । भक्तजनीं पृच्छा केली ।
एकाएकी आली गेली । रहस्य यांतील कथावें ॥ ९५ ॥
सद्‌गुरु वदते ते काळीं । संकटें घालिती भक्तमंडळी ।
पादुका ठेविल्या होत्या जळीं । तेणें ऐसें जाहले ॥ ९६ ॥
तंव सांगलीहून वर्तमान । आलें हरिलें श्रींनी विघ्न ।
सकळीं आश्चर्य पावोन । गुरुचरणा वंदिती ॥ ९७ ॥
असो ऐसी गुरुमाउली । बहुतांचे उपयोगा आली ।
स्वयें तरोनि तारिली । जनसंख्या अनिवार ॥ ९८ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः पंचमः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय दहावा
समास सहावा

नमो रावणमदहारी । देहबंधनमुक्तिकारी ।
बिभीषण साह्यकारी । अघनाशना रघुपते ॥ १ ॥
नमो सीताशोकविनाशना । अखिलसाधुमनरंजना ।
भरतप्रिय वियोगहरणा । नृपाधीशा नमो तुज ॥ २ ॥
रामनाम साधनसार । इतर साधनें निःसार ।
कलियुगीं भव दुस्तर । तार्क नौका रामनाम ॥ ३ ॥
गुरु सर्वज्ञांचा राजा । मेळवी नामधारक फौजा ।
प्रत्यक्ष करोनि दाविती काजा । नामपुण्यप्रतापें ॥ ४ ॥
ऐसा करीत उपदेश । नामीं लाविती नरांस ।
विप्रश्रेष्ठ विद्वज्जनांस । हें कांही मानेना ॥ ५ ॥
म्हणती विप्र वेदाधिकारी । त्यासी पूज्य गायत्री ।
इतर वर्ण नामाधिकारी । विप्रांसी हे अनुचित ॥ ६ ॥
गायत्रीमंत्र वेदसार । विप्रासी तारक आधार ।
श्रुतिस्मृतिपुराणांचा विचार । पूज्य एक गायत्री ॥ ७ ॥
ऐसा असतां आधार । भुलविती बोधूनिया नर ।
रामनाम म्हणोनि सार । जपानुष्ठानें करविती ॥ ८ ॥
ऐसियानें भ्रष्टता घडे । वेदश्रद्धा समूळ उडे ।
म्हणोनि लाविती वांकडें । सद्‌गुरूंसी ॥ ९ ॥
महाराज वदती सर्वांसी । ’जमा सर्व एके दिवशी ।
नामचि तारख विश्वासी । शंका फेडूं साधार’ ॥ १० ॥
ऐसे वदतां गुरुवर । सकळां मानला विचार ।
दिवस नेमून दरबार । भरला सुज्ञ द्विजांचा ॥ ११ ॥
सद्‌गुरु वदती द्विजांसी । ’तुम्ही ज्ञानी गुणराशी ।
मी तो अज्ञ माणदेशी । सलगी करितों गुरुकृपें ॥ १२ ॥
विप्रांसी गायत्री प्रमाण । किंबहुना केवळ प्राण ।
याचि सिद्धीनें विप्रगण । वंद्य झालें मानवा ॥ १३ ॥
अखिल देवता ज्याचे अधीन । तयासी हीन म्हणेल कवण ।
जें वेदांचें मूळस्थान । शब्दब्रह्म बीजरूप ॥ १४ ॥
अघनाशक ज्ञानदाता । मंत्रराज नसे यापरता ।
परि साधका‍अंगीं पात्रता । असतां बरें ॥ १५ ॥
वेचोक्त मंत्र प्रतापवंत । शुद्ध भूमिके सिद्धी देत ।
तयालागीं सतत । वैराग्य पाहिजे ॥ १६ ॥
यास्तव ऋषि महाज्ञानी । अलिप्त होते सर्वांपासोनी ।
नदी तडाग निर्जनवनीं । पर्णकुटिके राहती ॥ १७ ॥
समस्त राजे शरणागत । देवही थरथरां कांपत ।
परि वैराग्य कडकडित । एकभुक्त अजिनशय्या ॥ १८ ॥
आहारविहास सत्त्वस्थ । कार्याकारण देह रक्षित ।
मंत्रसिद्धी तयांप्रत । हस्त जोडून उभी असे ॥ १९ ॥
त्यांचेचि वंशज सगोत्र । तेचि परमपावन मंत्र ।
परि तेज शांति सिद्धि मात्र । कोणापाशीं दिसेना ॥ २० ॥
तैसें बंधविमोचक ज्ञान । तयासी गेले मुकोन ।
कोरडा राहिला अभिमान । समाधान नाही ॥ २१ ॥
भूमिका शुद्ध प्रेरक शुद्ध । आहारविहार असतां शुद्ध ।
तरीच होय मंत्र साद्य । पहावें धर्मग्रंथी ॥ २२ ॥
पर्जन्यसूक्तें वाहती धारा । आतां येईना शुष्क वारा ।
सूक्ष्म स्थिती अवधारा । कैसी आली ॥ २३ ॥
कृपा शाप सत्ता दोन्ही । दर्भ शर कोण न मानी ।
यास्तव आहारविहारसरणी । शुद्ध पाहिजे शास्त्रोक्त ॥ २४ ॥
कलि होवोन सबळ । ब्राह्मण्यासी झाला काळ ।
तेणें मंत्रसिद्धीचें बळ । विफल होत चालिलें ॥ २५ ॥
विप्र झाले विषयासक्त । वैभवेच्छा वाढली बहुत ।
वेदपठण जीवितार्थ । कांही शेष राहिले ॥ २६ ॥
सत्त्वगुण लया गेला । विप्र रजोगुणी बनला ।
त्याहीवरी तम आला । चित्तक्षोभ करीतसे ॥ २७ ॥
देहसुखा लोलुप झाले । तेणें शुद्ध ज्ञानासी मुकले ।
अशाश्वतें शाश्वत ग्रासिलें । कालानुरोधें ॥ २८ ॥
आहार विहास संगति । वर्णाश्रमातें बुडविती ।
ऐसी विपरीत कालगति । कर्म सांग घडेना ॥ २९ ॥
शक्य तितुकें करावें । परि त्यावरी न विसंबावें ।
चित्तशुद्धीस्तव घ्यावें । रामनाम निर्बंध ॥ ३० ॥
पुढील भविष्य जाणोनि । सुलभ नाम कथिलें ज्यांनी ।
वेद पुराणें संतवाणी । स्वानुभवही तैसाचि ॥ ३१ ॥
कृतयुगीं ध्यान करणें । त्रेतायुगीं हवन देणें ।
द्वापारीं देवतार्चनें । कलीं साधन कीर्तन ॥ ३२ ॥
ऐसें बहुतीं पुराणीं । वदली श्रीव्यासवाणी ।
यास्तव श्रेष्ठ सर्वांहुनी । नाम साधन कलियुगीं ॥ ३३ ॥
साडेतीन कोटी जप होतां । चित्ताची जाय मलिनता ।
तेरा कोटी सांगता । जन्ममृत्युची’ ॥ ३४ ॥
विप्र वदती सद्‌गुरूंसी । ’वेदाज्ञा दावा आम्हांसी ।
आधुनिक संतवाक्यासी । न गणूं प्रमाण’ ॥ ३५ ॥
सद्‌गुरु वदती ते समयीं । ’उपनिषदें आणा लवलाही ।
अथर्वणवेदांतर्गत पाही । कलिसंतरणोपनिषत्‌ ’ ॥ ३६ ॥
तत्काळ उपनिषदांसी । आणविलें त्या समयासी ।
शोधूनियां छंदांसी । अर्थ बोला वदती गुरु ॥ ३७ ॥विद्वज्जनीं विवरण केला । नाममहिमा जो वर्णिला ।
साडेतीन कोटी जपाला । करितां होय चित्त शुद्धि ॥ ३८ ॥
कलियुगीं नामचि श्रेष्ठ । इतर साधन वृथा कष्ट ।
ऐसा आधार श्रीगुरु स्पष्ट । दावोनि देती द्विजांसी ॥ ३९ ॥
’साधु वेदबाह्य वदती । ऐसी तुम्हां शंका होती ।
परि वेदगुह्य साधूच जाणती । इतरां गूढ कळेना ॥ ४० ॥
वेदां जें अगोचर । तेंचि साधु स्वयें सार ।
यास्तव शंका अणुभर । सिद्धवचनीं न धरावी ॥ ४१ ॥
वेद तरी ईशस्तुति । नामही नव्हे नरकीर्ति ।
जेथें वेदांची उत्पत्ति । त्या आधीं हरिः ॐ ॥ ४२ ॥
स्वधर्मकर्में नित्य करितां । चित्ताची जाय मलिनता ।
परि तीं सांग न घडतां । महादोष बोलिले ॥ ४३ ॥
नाम घेतां दोष हरती । अवाक्षर होतांही मुक्ति ।
लयकारण तयांप्रति । वाल्हा म्हणे ’मरा मरा’ ॥ ४४ ॥
नाम साधन अनादि । शांति पावले शिवादि ।
कलियुगीं तराया भवाब्धि । विशेषत्वें वर्णिलें ॥ ४५ ॥
रामनाम आणि वेद । उभय साधनें जगद्वंद्य ।
परि आहाराविहारादि बंध । वैदिककर्मा मुख्यत्वें ॥ ४६ ॥
प्रस्तुत तें बंधन सुटलें । यास्तव सुलभ नाम प्रतिष्ठिलें ।
वेदां अंतर्बाह्य संचलें । नाही आणिकें पाहुणें ॥ ४७ ॥
आणिक परिसा अभिप्राय चतुर । नामधारकें वेदीं अनादर ।
करितां त्यासी सुविचार । केव्हांही म्हणूं नये ॥ ४८ ॥
वेदपुरुष नारायण । वेदवक्ता भगवान ।
वेद तोषवी जगज्जीवन । वेद मूळ जगतासी ॥ ४९ ॥
वेद आणि नाम । भिन्न माणणें हाचि भ्रम ।
आदिपुरुषापासोन दोहींचा उगम । स्थळ वेळ एकचि’ ॥ ५० ॥
असो ऐसें समाधान । सकलांचें केलें पूर्ण ।
मग नामगजर करोन । सकल गुरूंसी वंदिती ॥ ५१ ॥
समर्थांसी ऐसी रीती । जरी नाम उपदेशिती ।
तरी वैदिक करविती । अत्यादरेंकरोनी ॥ ५२ ॥
नित्य शनिवार गुरुवार । अभिषेक सर्व देवांवर ।
रूद्र पवमानसूक्तें प्रकार । ज्यासी प्रिय ते तयासी ॥ ५३ ॥
दोनवार पुरश्चरण । गायत्रीचें करविती गहन ।
रुद्रस्वाहाकार वेदपठण । विप्रांकरवी करविती ॥ ५४ ॥
नित्य उपासनेभीतरीं । चतुर्वेदसेवा बरी ।
चाले श्रीगुरूंचे घरीं । श्रोते तुम्ही अवधारा ॥ ५५ ॥
वाराणसीं पंढरीस । करविती वेदघोषास ।
दक्षिणा देवोन बहुवर । वेदज्ञ विप्रां पूजिती ॥ ५६ ॥
गोंदवल्यासी वैदिक किती । सद्‌गुरु आदरें ठेविती ।
क्षेत्र देवोन कुलगुरुप्रति । सदा सन्निध ठेविलें ॥ ५७ ॥
यजुर्वेदी गुरुवर । परि चहूं वेदीं अत्यादर ।
एकदां एक प्रकार । घडला तो परिसावा ॥ ५८ ॥
मंदिरीं मंत्रपुष्पसमयीं । यजुःशाखी करिती घाई ।
आदौ देवे म्हणतां पाहीं । ऋक्‌शाखी तापले ॥ ५९ ॥
उभयतांचा चालला तंटा । यजुःशाखी अभिमान मोठा ।
स्वशाखीं सद्‌गुरुमठा । मान यजुर्वेदासी ॥ ६० ॥
ऋग्वेदी वदती ’ऐसे नव्हे । ऋग्वेद श्रेष्ठ स्वभावें ।
तयासी आधीं मानावें । शास्त्ररूढी ऐसी असे’ ॥ ६१ ॥
भांडत गेले गुरूंपाशी । श्रीगुरु वदती तयांसी ।
ऋग्वेद थोर सर्वांसी । तोचि आधी म्हणावा । ॥ ६२ ॥
ऐसें वदतां गुरुवर । यजुःशाखी झाले चूर ।
आपुला अभिमान धरितील कीर । ऐसी आशा जयांसी ॥ ६३ ॥
असो ऐसे गुरुराव । वैदिककर्में करिती सर्व ।
परि नामसाधनीं दृढभाव । साधन सुलभ या कालीं ॥ ६४ ॥
योगियां तेंचि कथिती । प्राणापाना कोंडितां निश्चितीं ।
न होय वासनानिवृत्ति । एकदेशी बंधन ॥ ६५ ॥
गुरु सर्वज्ञ सकलगुणें । क्वचित्काळीं वेदवचनें ।
नेमकीं कथोन समाधानें । करिती वैदिकद्विजांचीं । ॥ ६६ ॥
कधीं वेद नाहीं पढले । परि वेदगुह्य साध्य झालें ।
तयांसी अज्ञेय नुरलें । अणुभरही त्रिकाळीं ॥ ६७ ॥
नामें तुटती उपाधि । नामें सहजसमाधि ।
नामें होय अनादि- । स्वरूपाशीं तन्मयता ॥ ६८ ॥
आणिकही ये समयीं । एक गुरुबोध ठेवा हृदयीं ।
शास्त्ररूढी लौकिक पाही । उपासनामदें न सोडावे ॥ ६९ ॥
न दुखवितां परांतर । अगत्य करा कुलाचार ।
परि नामीं रंगलें जयाचें अंतर । त्यासी बंधन नसे हें ॥ ७० ॥
नामें होय ज्ञानोदय । नामें होय वासनाक्षय ।
नामें होय स्वयेंचि ध्येय । निर्विकार निजवस्तु ॥ ७१ ॥
येणेंपरी नामसार । सकलां बोधिती गुरुवर ।
नामीं लावोन असंख्य नर । तारिले आणी तारिती ॥ ७२ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ७३ ॥
॥ इति श्रीसद्‌गुगुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः षष्ठः समासः ॥
॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय अकरावा
समास पहिला

तनू जीर्ण झाली बहु कार्य केले । रघूनायकें शीघ्र पाचारियेले ॥
तदा रामरूपीं समाधिस्थ होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ११ ॥

जयजय श्रीसद्‌गुरु माहेरा । करुणार्णवा अघहरा ।
मायबाप सोयरा । निश्चयात्मक तूं एक ॥ १ ॥
सूक्ष्म वासने जन्म झाला । तिनें अहंता पति वरिला ।
औट चाहूर वतनाला । भूल पडली पाहोनी ॥ २ ॥
द्वैत सासू आणि श्वशूर । मजवरी प्रेम तयांचे फार ।
लोभ मोह दोघे दीर । साहित्य पुरविती ॥ ३ ॥
आशा ममता पतिभगिनी । काय सा>न्गूं तयांची करणी ।
ब्रह्मांड संसार उभारोनी । प्रप।ची गोविती मजलागीं ॥ ४ ॥
मी मी म्हणावया शिकविलें । माझें म्हणोन वेड लाविलें ।
बळेंचि संसारीं अडकविलें । निःसंगासी ॥ ५ ॥
अहंपतीचें प्रेम भारी । न विसंबे क्षणभरी ।
माहेरींची स्मृति सारी । बाळपणींची विसरली ॥ ६ ॥
मी आणि माझा संसार । हेंचि एक भासलें सार ।
सासू सासरे आणि दीर । नणंदांचे प्रेम बहु ॥ ७ ॥
ऐसा संसार थाटला । मद संपत्तीनें भरला ।
तत्क्षणीं फळा आला । क्रोध सुपुत्र ॥ ८ ॥
दुर्वच शर्करा वांटिली । आपली प्रौढी मिरविली ।
दुरित गुढी उभारिली । आनंद थ्र मानिला ॥ ९ ॥
तंव आणीकही अपत्यें झालीं । भय शोक बालकें वाढणीं ।
मानिलें सुखाची समाप्ती केली । त्रिवर्ग सुतांनी ॥ १० ॥
वासना विषय सूक्ष्मतंतें । मजला आणिलें या पंथें ।
कष्त करोनि मरतें । तरी सुखलेश नाहीं ॥ ११ ॥
मोहें केला हव्यास । तो झाला सासुरवास ।
जाच परि सुखास । इच्छितसें तयामध्यें ॥ १२ ॥
तंव संत मायबहिणी । भेटल्या संसारकाननीं ।
कथिली तयांसी कहाणी । सुख सत्य कीं मिथ्या ॥ १३ ॥
त्या संगती संसार । दुःखराशींचे डोंगर ।
अंती घात करणार । अंधवापींत बुडवोनी ॥ १४ ॥
सुखासी केली खटपट । ती अवघीच पोंचट ।
पोंचट असोन बळकट । सुटणार नाहीं ॥ १५ ॥
तेलियाचा फिरता बैल । म्हणे मार्ग कधी सरेल ।
सत्य पाहतां घरींच हा खेळ । होत जातो ॥ १६ ॥
तैसाचि हा संसारपंथ । सारितां सरेना सत्य ।
अहंता अंधारीं काधितां व्यक्त । क्षणिक भासे ॥ १७ ॥
सत्य म्हणता स्वप्नवत्‍६ । स्वप्न म्हणतां भासे सत्य ।
गुरुमाय दुरोनि पहात । कौतुक सारें ॥ १८ ॥
ऐसें तयांनी कथिलें । तेव्हां बाळपण आठवलें ।
माहेरीं जावें म्हणितलें ।परि पति हट्टी सोडिना ॥ १९ ॥
यास्तव करितसें विनवणी । माये स्वहस्तें धरोनी ।
घेऊन जाईं स्वसदनीं । प्रेमपान्हा पाजवीं ॥ २० ॥
संतसज्जन मुर्हानळी । पाठवोन लाविली कळी ।
जाचती हीं अधिक सगळीं । धीर मजसी धरवेना ॥ २१ ॥
जीव द्यावा म्हणाल झणीं । तरी पति विलक्षणी ।
चौर्यांाशी लक्ष योनी । कूपीं फ्रता पाठीं असे ॥ २२ ॥
बहुत येवोन काकुलती । माये हीच विनंती ।
माहेर दाखवी स्वहस्तीं । कृपादृष्टी करोनि ॥ २३ ॥
असो ऐसी गुरुमाउली । आम्हीं आतां आठविली ।
कृपा करील ते काळीं । सौख्य भोगूं ॥ २४ ॥
बहुतांलागीं पावली । इहपर सौख्यद झाली ।
मज दीनासी भेटली । तेचि पुढतीं निरूपिजेल ॥ २५ ॥
कागवाडकर रामदासी । गणूबुवा वदती जयांसी ।
सदा ध्याती गुरुचरणांसी । रामभक्त महाभले ॥ २६ ॥
गृहीं बांधोनि मंदिर । मूर्ति स्थापिल्या सुंदर ।
सेवा करिती अत्यादर । गृहस्थाश्रमीं राहती ॥ २७ ॥
गुरुदर्शनीं अतिप्रीति । वरचेवरी धांव घेती ।
प्रपंची उदास वागती । आवडी रामसेवेची ॥ २८ ॥
एकदां स्थिति ऐसी झाली । हनुमानमूर्ति भंगली ।
चित्तवृत्ति दुश्चित झाली । आता कैसें करावें ॥ २९ ॥
धांव घेतली गुरूंकडे । वदती झालें जें सांकडें ।
मारुति नसतां रामापुढें व्यंग दिसे आम्हांसी ॥ ३० ॥
कृपा करोन दीनावरी । चरण लागावे मंदिरीं ।
मारुतीची स्थापना बरी । स्वहस्तें करावी ॥ ३१ ॥
संतचरण लागतां सहज । सुफल होईल धरिलें काज ।
एवढें द्यावें प्रेमव्याज । कृपादृष्टी करोनी ॥ ३२ ॥
वारंवार प्रार्थना करिती । सद्‌गुरु तयां अभय देती ।
येऊं तुमचे गृहाप्रती । सत्य सत्य जाणावें ॥ ३३ ॥
ऐसें आश्वासन दिलेन । दुःखित चित्ता शांतविलें ।
परि आज उद्यां करितां गेले । बहुत दिवस ॥ ३४ ॥
संत येणार माझे घरीं । सूक्ष्म अहंकार अंतरीं ।
उठला तो जाणिला चतुरीं । म्हणोनि विलंब लाविला ॥ ३५ ॥
बहुत केली प्रार्थना । उपवास करिती नाना ।
श्रीगुरु वदती हठयोग जाणा । कदापि करूं नये ॥ ३६ ॥
तुम्ही जावें आतां गृहासी । आम्ही येऊं अमुक दिवशीं ।
हर्षें भरोन रामदासी । स्वगृहीं परतले ॥ ३७ ॥
नाना साहित्य जमा केलें । मंदिर सर्व शृंगारिलें ।
गुरुदर्शन घडेल वहिलें । आनंद नगरवासियां ॥ ३८ ॥पदें रचोनि मेळा केला । तो प्रसाद मजसी मिळाला ।
कीर्ति परिसोनि कवित्वाला । रचिलें जनप्रीतीस्तव ॥ ३९ ॥
कलियुगीं साधु नसती । ऐसी मज भावना होती ।
अनुग्रह घ्या कोणी वदती । उगाच होकार देतसे ॥ ४० ॥
ठरली वेळे निघोन गेली । गुरुमूर्ति नाहीं आली ।
तैं उदासीनता आली । रामदासीबुवांसी ॥ ४१ ॥
आमुचा नसे अधिकार । कां कृपा करील गुरुवर ।
ऐसा निराशेचा उद्भवोनि अंकुर । उपोषण सुरू केलें ॥ ४२ ॥
सात दिवसपर्यंत । उपोषणें देह कष्टवित ।
जरी न येती समर्थ । तरी प्राण त्यजावा ॥ ४३ ॥
ऐसा निश्चय करोनि । सात दिवस काढिले त्यांनी ।
तरी गुरुजननी येण्याची वार्ता दिसेना ॥ ४४ ॥
चित्त अत्यंत दुखावलें । जिणें निरर्थक भासलें ।
सोमल घेऊं आरंभिलें । औदासिन्य येवोनि ॥ ४५ ॥
तंव पूर्वींच दोंदवलीसी । सद्‌गुरु कथिती दोघाजणांसी ।
शीघ्र जावें कागवाडासी । अंताजीपंत आणि व्यंकणभट ॥ ४६ ॥
इकडे रामदासियांनी विष कालविलें । तंव हे दोघे दारीं उभे ठेले ।
सद्‌गुरु यावया निघाले । ऐसी अमृतवाणी कथियेली ॥ ४७ ॥
आम्हां पाथविले पुढती । समर्थ मागोन शीघ्र येती ।
सत्वर करावी आयती । रामदासें विष दडविलें ॥ ४८ ॥
अंतर्ज्ञानी गुरुराव । करणी करिती अभिनव ।
शरण्या देती अनुभव । परि निष्ठा पहती ॥ ४९ ॥
आगगाडीचे अड्ड्यावरी । पावली सद्‌गुरूंची स्वारी ।
निरोप येतांच सत्वरीं । सामोरे धांवती ॥ ५० ॥
रांगोळ्या सडे घातले । ताशे मर्फे थडथडले ।
भजनीसमुदाय निघाले । टाळ वीणा घेवोनी ॥ ५१ ॥
सुस्वर कंठें मेळे गाती । आणूं चला गुरुमूर्ति ।
हातीं टिपर्याम वाजविती । शोभा दिसे अपूर्व ॥ ५२ ॥
असो ऐसी आयती झाली । वेळीं मंडळीं समीप आली ।
लोळती श्रींचे चरणकमळी । पोटीं आनंद न समाये ॥ ५३ ॥
वाजतगाजत मिरवीत । रामनामें गर्जवीत ।
माय पावली ते पेठेंत । सुवासिनी आरत्या ओंवाळिती ॥ ५४ ॥
तेच क्षणीं दृष्टादृष्ट । होतां फळले अदृष्ट ।
अंतरींचे निघालें क्लिष्ट । सर्वभावें नत झालों ॥ ५५ ॥
कृपादृष्टीचा महिमा । वर्णूं न शके चतुर्मुख ब्रह्मा ।
शब्द खटाटोप रिकामा । अनुभवेंचि जाणावें ॥ ५६ ॥
आनंदातील शुद्ध कंद । तो हा सद्‌गुरुप्रसाद ।
समरसें होवोनि धुंद । मायामोहीं गवसेना ॥ ५७ ॥
असो उत्साह चालिला थोर । समुदाय लोटला फार ।
रामनामध्वनीनें नगर । सर्वही दुमदुमलें ॥ ५८ ॥
दोनशें माणसांचें अन्न । शतशः पात्रें उठलीं जाण ।
परि ते वेळीं आठवण । कोणासीच न झाली ॥ ५९ ॥
जितुके लोक दर्शना येती । तितुके प्रसादा सेविती ।
चक्रावळीनें पंक्ती उठती । वारंवार कित्येक ॥ ६० ॥
गणपतराव रामदासी । यांचे निमित्तें आम्हांसी ।
दर्शन घडलें चरणासी । धन्य धन्य गुरुपद ॥ ६१ ॥
बाजारी नारळ मिळेना । म्हणती पत्रावळी ना ना ।
यावरोनि पहाना । किती समुदाय लोटला ॥ ६२ ॥
तोगग्रस्तां नाहीं मिती । भुतें त्रस्त किती जमती ।
साधुदर्शना भाविक येती । बैसाया ठाव मिळेना ॥ ६३ ॥
इतुकियांचे करिती समाधान । सकळां देती भोजन ।
लहानथोर समसमान । मधुरभाषणें शांतविती ॥ ६४ ॥
खेड्याचें शहर बनलें । जागोजागीं थवे बैसले ।
संतमाहात्म्य आगळें । अभाग्यासी उमजेना ॥ ६५ ॥
शके अथराशें एकतीस । सौम्यनाम संवत्सरास ।
शुद्धपक्ष आषाढ मास । दिनशुद्धि पाहिली ॥ ६६ ॥
मघां पंचमी सुप्रभातीं । बुधवारीं मिथुनावरती ।
स्वहस्तें स्थापिला मारुति । सद्‌गुरूंनीं कागवाडी ॥ ६७ ॥
दुसरे दिवशी गुरुवार । गुरुभक्तां शुभ फार ।
तेव्हां अनुग्रह केला मजवर । पतिता हातीं धरियेलें ॥ ६८ ॥
अनंत सुकृतें फळा आलीं । चुकली माय भेटली ।
बोधामृत श्रवणीं घाली । धन्य सुदिन आयुष्यीं ॥ ६९ ॥
निर्धना दाविलें धन । आंधळ्या दिधले नयन ।
मृता करविलें अमृतपान । आनं अकाय सांगावा ॥ ७० ॥
विश्वबंधुत्व मिळालें । समर्थ पाथिराखे झाले ।
धन्य भाग्य उदेलें सेवक मी समर्थांचा ॥ ७१ ॥
असो ऐसे कागवाडासी । ब्रह्मचैतन्य हनुमदंशी ।
सद्‌गुरु भेटले आम्हांसी । पुढील कथा अवधारा ॥ ७२ ॥
चार दिवसपर्यंत । सोहळा झाला अद्भुत ।
श्रवण करा सावचित्त । श्रोते तुम्ही गुणभोक्ते ॥ ७३ ॥
अवगुणांते त्यजोनी । सद्‌गुणांतें शोधोनी ।
गुरुलीला ही म्हणोनि । अव्हेर न करावा ॥ ७४ ॥
पुढील समासीं निरूपण । कागवाडी श्रीज्ञानघन ।
बहुत चमत्कार दावोन । उपासना वाढविती ॥ ७५ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय अकरावा
समास दुसरा

ॐ नमो सद्‌गुरुराया । भीति दाविते मज माया ।
यास्तव धरिलें पायां । दासउ पेक्षा न करावी ॥ १ ॥
ज्ञान अज्ञान कळेना । वरी पाअतां न ये अनुमाना ।
कागवाड क्षेत्रामाजीं पहा ना । महारीण उद्धरिली ॥ २ ॥
ती कथा आहे कैसी । श्रोते परिती प्रश्नासी ।
तरी परिसा सविस्तरेंसी । कथन करूं ॥ ३ ॥
संताबाई नामेंकरून । होती तेथें महारीण ।
नित्य मंदिरीं येवोन । झाडलोट करितसे ॥ ४ ॥
महाराज श्रीगोंदवलेकर । कधीं ना पाहिले साचार ।
परि पुसे वारंवार । कधीं येती म्हणोन ॥ ५ ॥
बुवा पुसती तियेसी । समर्थ येतां काय करिसी ।
महारीण वदे तयांसी । मरणमुक्ति मागेन ॥ ६ ॥
जंव ते दिवस जवळीं आले । तंव स्वल्प धन मिळविलें ।
शेजारियापाशीं दिलें । उत्तरकार्य करा म्हणे ॥ ७ ॥
थट्टेवरी चालिली गोष्ट । तंव आली समर्थभेत ।
महारीण पावली नीट । समर्थचरना वंदन करी ॥ ८ ॥
विनवीतसे कर जोडोन । ’आतां सोडव भवांतून ।
संचित होतें तें दारुण । भोगून सारिलें आजवरी ॥ ९ ॥
कांही शेष उरला असेल । तरी दर्शनें विलया जाईल ।
तीर्थप्रसाद शमवील । संतमाहात्म्य अगाध ।
तीर्थप्रसाद देवोनी । निरोप द्यावा मजलागोनी ।
आतां सोडवीं ही जाचणी । मलिन देहाची’ ॥ ११ ॥
सद्‌गुरु मनीं संतोषले । चरणतीर्थ तियेसीं दिलें ।
प्रसाद देवोनि कथिलें । ’शीघ्र जाईं स्वस्थाना’ ॥ १२ ॥
वारंवार भेवोन दर्शन । वदे ’पतिता केले पावन ।
दीन दयाळु कृपाघन । येतें, लोभ असूं द्यावा’ ॥ १३ ॥
गृहीं जावोन सकळांसी । निरोप मागे अति हर्षीं ।
मग ;राम; म्हणोन देहासी । सोडती झाली ॥ १४ ॥
महार आले। सांगत । ’महारीण झाली मृत’ ।
सद्‌गुरु वदती पुण्यशील बहुत । सांग संस्कार करावा ॥ १५ ॥
पूर्वजन्मार्जित तिजसी ज्ञान । परि संचित राहिलें दारुण ।
इहजन्मीं भोगिलें सारून । आतां मुक्त जाहली’ ॥ १६ ॥
तिनें द्रव्य ठेविलें होतें वरी दिधलें समर्थें ।
अन्नदानें सकळांतें । तृप्त केलें ॥ १७ ॥
असो सांगावया कारण । साधीभोळी महारीण ।
परि तिजसी असेल ज्ञान । हें स्वप्नींही नसे कवणाच्या ॥ १८ ॥
ज्ञानस्थिति सांभाळणें किती कथीण देव जाणे ।
आम्ही अर्धशब्दज्ञानें । घरोघरीं बडबडतों ॥ १९ ॥
अप्पासाहेब पाटील थोर । श्रीगुरूंसी करुनी नमस्कार ।
वदती ’गृहीं चलावें सत्वर । आटींव दूध करविलें।’ ॥ २० ॥
शुद्धभाव पाहोनि । श्रीगुरु गेले त्यांचे सदनीं ।
क्षीर असे कळशीभरोनी । समुदाय तरी तीन शतक ॥ २१ ॥
स्वस्तें पात्रें भरोनी । सकलां पाजी गुरुजननी ।
अभिनव केली करणी । प्रसाद राहिला दोन शेर ॥ २२ ॥
जेथें होतें राममंदिर । तेथें जवळींच असे विहीर ।
परि पाणी असे बहु क्षार । मुखीं कांहीं घालवेना ॥ २३ ॥
समर्थ वदती बुवांसी । ’श्रीउत्साहसमयासी ।
घेत जा जल पाकासी । राम गोडी आणील’ ॥ २४ ॥
तेच क्षणी गोसावी एक । रामेश्वरीं निघाला देख ।
मार्गीं तया आकस्मित । दृष्टांत होय शंभूचा ॥ २५ ॥
येथून जवळीं कागवाड नगरीं । सद्‌गुरु ब्रह्मचैतन्य स्वारी ।
गंगा तया घालीं सत्वरीं । म्हणजे आम्हां पावेल ॥ २६ ॥
यास्तव गोसावी तेथें । आला गंगा घालावयातें ।
त्यांतील गंगा घेऊन हस्तें । विहिरीमाजी सोडिली ॥ २७ ॥
क्षर पाणी गोड झालें । मंदिरीं उपयोगा आलें ।
प्रत्यक्ष परमात्मा अवतरले। म्हणती सर्व ॥ २८ ॥
अत्मारामपंत कुळकर्णी । श्रींसी नेती स्वसदनीं ।
सद्भावें पद पूजोनी । फराळासी घालिती ॥ २९ ॥
ते समयीं मेळ्यांतील पदें । मुलें म्हणती आनंदे ।
सद्‌गुरु पुसती विनोदें । ’कोणी रचिलीं मज सांगा’ ॥ ३० ॥
मुलें म्हणती ’गोपाळराव । फडके असे उपनांव ।
तयांनीं रचिलीं सर्व । श्रीचरणीं वहावया’ ॥ ३१ ॥
तोचि प्रसाद ये समयीं । अर्पिलासे समर्थपायीं ।
तन्निमित्तें सेवा सर्वही । पहाप्रसाद संतांचा ॥ ३३ ॥
अप्पासाहेब कागवाडकर । मामासाहेब इनामदार ।
दोघेही नेती गुरुवर । स्वगृहीं भोजना ॥ ३४ ॥
श्रीगुरु करविती पायस । वांटिती अन्य यातींस ।
जैन आणि लिंगाइतांस । त्यांचे हस्तें वाढविती ॥ ३५ ॥
आपुला धर्म सोडूं नये । दुजियाचा धरूं नये ।
बोधिती सद्‌गुरु स्वयें ध्यानीं धरा भाविकहो ॥ ३६ ॥
असो ऐसा उत्साह थोर । होतां आनंदलें नगर ।
दर्शना येती असंख्य नर । गांवोगांवींचे ॥ ३७ ॥
मुरारजी भाते गिरणीवाले । भाविक श्रीमान गृहस्थ भले ।
श्रीगुरूंचे दर्शना आले । आनंदले मानसीं ॥ ३८ ॥
प्रसाद व्हावा गिरणीवरी । ऐसें विनविती परोपरी ।
गुरु वदती ते अवसरीं अवश्य येऊं म्हणोनि ॥ ३९ ॥
परि अठरापगड यातींसी । बोलवावें प्रसादासी ।
जैन आणि लिंगायतांसी । निराळा पाक करावा ॥ ४० ॥
हो जी म्हणोनि अंगिकारिलें । स्थान सर्व श्रृंगारिलें ।
बल्लव चतुर आणिले । षड्रसान्नें करावया ॥ ४१ ॥ग्रामवासी समस्त जन । केलें तयां निमंत्रण ।
सद्भावें श्रींसी पूजोन । वस्त्रें अर्पिली बहुमोल ॥ ४२ ॥
प्रेमें केलें गांवभोजन । पाहतां श्रीगुरु झाले प्रसन्न ।
आशीर्वाद देती ’संतान । होईल तुजसी’ म्हणोनी । ४३ ॥
संतान नाहीं म्हणोनी । चिंता करीत होता मनीं ।
श्रींनी हें जाणोनी । कृपा केली तयावरी ॥ ४४ ॥
पुढती तया पुत्र झाला । आशीर्वाद फळा आला ।
ऐसा सद्‌गुरु पावला । बहुतांसी ॥ ४५ ॥
कगुडराय पुरातन । स्थान भुयारीं असे गहन ।
श्रीगुरु तेथें जाऊन । शालिग्राममूर्ति पाहती ॥ ४६ ॥
आणि अंतर्भुयारांत । योगमार्गें सद्‌गुरु जात ।
योगी बैसले ध्यानस्थ । म्हणोनि सांगती सकळांसी ॥ ४७ ॥
आंत कोणी जाऊं पाहती । तरी भुंगे डसों धांवती ।
शोधूण जातां सद्‌गुरु वदती । ग्रामास घडेल अपाय ॥ ४८ ॥
असो ऐशी गुरुमाउली । कागवाड क्षेत्रीं बहु रमली ।
रामउऐपासना वाढविली । अनुग्रह देवोनिया ॥ ४९ ॥
तेथून निघाले सकल आडवे पडती । वियोगें दुःखाश्रु ढाळिती ।
चार दिवस गृहाप्रती विसरले होते ॥ ५० ॥
बोधून सकळां शांतविती । येऊं म्हणती शीघ्र पुढतीं ।
नामधारकापाशीं वसति । अहर्निश असे आमुची ॥ ५१ ॥
असो नामाच्या गजरांत । निघते झाले श्रीरघुनाथ ।
भक्त उगारग्रामीं घेऊन जात । अत्याग्रह करोनी ॥ ५२ ॥
तेथून पुढें मिरजेसी । जाते झाले ज्ञानराशी ।
अनंत भक्त दर्शनासी । आजूबाजूचे धांवती ॥ ५३ ॥
श्रेतीं आशंका घेतली । हीच भेटी सविस्तर वर्णिली ।
सद्‌गुरु जाती अनेक स्थळीं । उत्तर दक्षिण भागांत ॥ ५४ ॥
साच प्रशन बरवा केला । साग्र वर्णावी सद्‌गुरुलीला ।
परी शक्ति कैंची मानवाला । सद्‌गुरुलीला अगाध ॥ ५५ ॥
काशीपासोन रामेश्वरी । बारा वेळ पादचारी ।
फिरती झाली श्रीगुरुस्वारी । मार्गीं गांव कित्येक ॥ ५६ ॥
जे गांवचे नांव घ्यावें । वदती आम्हां असें ठावें ।
बाळपणीं गेलों होतों स्वभावें । खाणाखूणा सांगती ॥ ५७ ॥
प्रत्येक ठायीं परोपकार । कांही घडती चमत्कार ।
लिहितां ग्रंथ वाढेल फार । अशक्य असे आम्हांसी ॥ ५८ ॥
येविषयीं एक दृष्टांत । आठवला तो कथितों येथ ।
त्यावरोन जाईल किंत । अशक्य दुर्लंघ्य म्हणोनी ॥ ५९ ॥
बालपणीं फिरतां मही । हल्याळग्रामीं पाहीं ।
गेले परि ठवठिकाणा नाहीं । कोण कोथील म्हणोनी ॥ ६० ॥
तेथें एका विप्रसुतासी । ज्वर भरला प्राणनाशी ।
सद्‌गुरु अकस्मात्‌ त्या समयासी । भिक्षामिषें गृहीं गेले ॥ ६१ ॥
माउली दिसे सचिंत । नयनीं अश्रु ढाळित ।
द्रवले श्रीगुरुनाथ । वृत्तांत सर्व परिसला ॥ ६२ ॥
शीघ्र जावोन गृहांत । मुलाकरवीं उदक हातांत ।
स्वयें घेवोनि निश्चिंत । रहा म्हणती तयासी ॥ ६३ ॥
पुढें वासुदेवभट्ट नामेंकरोनी । ओळखीचे गृहस्थ होते कोणी ।
कथिती तयांलागोनी । ’घेतला ज्वर भोगणें असे ॥ ६४ ॥
विप्र पुत्र जगावा । गोसावी जातां माहीं पर्वा ।
तुम्ही समाचार घेत जावा । भोगून सारूं ज्वरासी’ ॥ ६५ ॥
ऐसें झालें संभाषण । कांहीं दिवस गेले निघोन ।
भट्ट पुन्हां करिती प्रश्न ।’ज्वर केव्हां भोगितां’ ॥ ६६ ॥
हो, हो, विसरलों आम्ही । बरी आठवण दिली तुम्हीं ।
एक खोली रिकामी । करोन द्यावी आम्हांसी’ ॥ ६७ ॥
अकरा दिवसपर्यंत होते थ्थें निद्रिस्त ।
ज्वर धुमारे बाहेर येत । कवाड बंद केलें असे ॥ ६८ ॥
द्वादशदिनीं बाहेर निघोनी । पथ्य घाला म्हणती झणीं ।
येतो स्नान करोनी । भोग भोगूनि सारिला ॥ ६९ ॥
नको म्हणतांही शीघ्र निघाले । विहिरींत जावोन बुडाले ।
वासुदेवभट्ट वरी राहिले । वाट पाहत समर्थांची ॥ ७० ॥
बहोत काळ नोघोन गेला । गोसावी वर नाहीं आला ।
म्हनती बाळ बुडूनि मेला । आतां कैसें करावें ॥ ७१ ॥
बोलाविती ग्रामाधिकारी । तंव वरी बैसली स्वारी ।
आश्चर्य मानती सारीं । चरणा वंदूं लागले ॥ ७२ ॥
बहुत लोक दर्शना येती । उपाधि नको साधकस्थितीं ।
म्हणोन शीघ्र निघोन जाती । ध्यास लागला सकळांसी ॥ ७३ ॥
कांही दिवस गेलियावर । दामूबुवा कुरवलीकर ।
कीर्तनाचा करीत गजर । सहज गेले हल्ल्याळीं ॥ ७४ ॥
सद्‌गुरूंची वर्णितां कीर्ति । वासुदेवभट्ट वंदोनि विनविती ।
दर्शना न्यावें आम्हांप्रति । अनुग्रहाची ओइच्छा असे ॥ ७५ ॥
मार्गीं कथिली मागील कथा । ऐसा साधु नाहीं आतां ।
थकलों आम्ही तया शोधितां । मंद भाग्य आमुचें ॥ ७६ ॥
उभयतां गोंदावलीं आले । श्रींचे चरन वंदिले ।
तंव श्रीगुरूंनी आलिंगिलें । वासुदेवभट्ट म्हणोनी ॥ ७७ ॥
इकडे कोणीकडे आलां । प्रपंच करोनी भागलां ।
गृहवृत्तांत पुशिला । सर्व कुशल असती ना ॥ ७८ ॥
पूर्वीं पाहिली सिद्धमूर्ति । तीच दिसे डोळ्यांपुढती ।
नयनीं आनंदाश्रु येती । चरण न्हाणिती श्रीगुरूंचे ॥ ७९ ॥
असो ऐसे बालपणीं बहुत फिरले जे अवनी ।
लिहितां न पुरे लेखणी । श्रोतीं रोष न करावा ॥ ८० ॥
स्वल्प काळ राहिले घरीं । बहुतेक फिरती दिशा चारी ।
जगदुद्धारक अवतारी । सिद्धपुरुष ॥ ८१ ॥
कागवाड येथील स्थिति । म्यां पाहिली प्रत्यक्षरीती ।
यास्ता कथिली तुम्हांप्रती । गुरुकथा रसाळ ॥ ८२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय अकरावा
समास तिसरा

याउपरी श्रीगुरुनाथ गोंदवले ग्रामींच राहत ।
श्वासविकार वाध्ला अत्यंत । शक्ति क्षीण जाहली ॥ १ ॥
परि असती ते विदेही । देहसंबंध तया नाही ।
वस्त्रापरी ठेविती पाही । केव्हां दूर केव्हां जवळी ॥ २ ॥
याचें पहा प्रत्यंतर । श्वास उठतां अनिवार ।
सकळा वाटे भय फार । केव्हां काय होईल ॥ ३ ॥
परि कोणी येतां परस्थ । श्वास जाय विलयाप्रत ।
शांतपणे समाचार पुसत । आश्चर्य वाटे सकळांसी ॥ ४ ॥
चार दोन दिवसांवरी । न बैसतां घोड्यावरी ।
घोडा दंगा फार करी । जवेळीं कोणा येऊं न दे ॥ ५ ॥
समर्थसेवा नाही घडली । म्हणजे गोदाही खिंकाळी ।
आम्हां मानवाअं भूल पडली । सेवासुख समजेना ॥ ६ ॥
असो श्वाससमयासी । दमवोन आणिती वारूसी ।
कार्यसमयी व्याधीसी । कोण पुसे ॥ ७ ॥
जनांसी मात्र उपदेशिती । ’चंचल जाय विलयाप्रति ।
निश्चळ ओळखोन धरा चित्तीं । शाश्वत एक गुरुपद ॥ ८ ॥
कोण वेळ कैसी स्थिति । हेईल हें न कळे पुढती ।
यास्तव साधक हो शीघ्रगै । शंका निरसा प्रश्नोत्तरें ॥ ९ ॥
कलि वाढला दुर्धर । साधु न राहती देहें स्थिर ।
याकारणें श्रीरघुवीर । आपुलासा करावा’ ॥ १० ॥
वरचेवरी कथिती ऐसें । परि मायेनें लाविले पिसें ।
आम्ही आळसी जैसे तैसे । माय मात्र कळवळे ॥ ११ ॥
असो ऐसी देहस्थिति । परि अखंड रामभक्ति ।
बहुतांचा उद्धार करिती । रामनाम बोधोनी ॥ १२ ॥
भक्तकार्यार्थ सोलापुरीं । एकदां गेली श्रेंची स्वारी ।
परतोन येतां माघारी । दृष्टांत होय विठूचा ॥ १३ ॥
’बडवे पुजारी कळी’ केली । माझी महापूजा राहिली ।
भक्त तुम्ही महाबळी । येवोन कलह तोडावा’ ॥ १४ ॥
कुर्डूवाडीहून फिरले । शीघ्र पंढरीस आले ।
विठ्ठलवच्रण वंदिले । देव भक्त महासखे ॥ १५ ॥
तंव इकडे प्रकार घडला । तंटा सरकारांत गेला ।
त्यांनी समर्थां लखोटा लिहिला । तोही पावला त्याच वेळी ॥ १६ ॥
’गृहकलह तोडावा तुम्ही । आम्ही असो परधर्मी ।
साधुशिरोमणी ये कामी । न्याय कराल तो सत्य’ ॥ १७ ॥
श्रीहरीचा हुकूम झाला । सरकारचा लखोटा आला ।
मग आरंभिलें कार्याला । तंट्याचें मूळ शोधिलें ॥ १८ ॥
देवाची वस्त्रें भूषणें । यांजसंबंधी तंटाभांडणें ।
येकासी येक घेतली म्हणे । कलह थोर मातला ॥ १९ ॥
श्रीगुरूंनी मोजदाद केली । उभयतांची समजूत घातली ।
महापूजां चालूं केली । सकळां आनंद वाटला ॥ २० ॥
तेथें आणिक थोडे दिवस । राहिले ते समयास ।
क्षेत्रमहिमा संगती विशेष । ऐसा नामगजर नाहीं अन्यत्र ॥ २१ ॥
पुंडलिकें उपकार केले ।वैकुंठींचे निधान आणिले ।
वेटेवरी उभे ठेले । भक्तकार्यार्थ रघुनाथ ॥ २२ ॥
उत्तरे क्षेत्र वाराणशी । दक्षिणे पंढरी अघनाशी ।
तीर्थें पुनीत व्हावयासी । सकल येती या ठायी ॥ २३ ॥
पंढरीक्षेत्रीं राहोनी । बोधिती बहुत अज्ञानी ।
रामभक्तीसी लावोनी । उद्धरिले अज्ञ जन ॥ २४ ॥
पुन्हा परतोन गोंदवलीसी । येते झाले ज्ञानराशी ।
आनंद नारीनरांसी । ग्रामस्थ जाती सामोरे ॥ २५ ॥
धन्य गोंदवलीचे जन । नित्य घडे गुरुदर्शन ।
नानाव्याधींचे निरसन । गुरुप्प्रसादें होतसे ॥ २६ ॥
कोणी अडचणींत गवसला । विनवी गुरुराजयाला ।
साह्य करिती तयाला । अर्थबोधेंकरोनी ॥ २७ ॥
व्यापार वाढला गहन । देशोदेशींचे विद्वज्जन ।
भेतती स्वयें येवोन । कुग्राम म्हणे कोण तया ॥ २८ ॥
श्रीराममंदिराप्रति । अन्नदाना नसे मिति ।
आणिक मजूर किती खाती । अठरा कारखाने ॥ २९ ॥
दरसाल नवीन इमारती । विहिरी किती खोदिती ।
अखंड चाले वाहती । समुदाय येत जातसे ॥ ३० ॥असो गोंदवल्याचे लोकां मायबाप सद्‌गुरु सखा ।
तैसाचि इतरां भाविकां । कल्पतरु गुरु माझा ॥ ३१ ॥
श्रीमंत ज्ञानी बहुत असती । परि परदुःखा नेणती ।
परदुःखा जे निवविती । तेचि होती जगद्वंद्य ॥ ३२ ॥
आपले आपण खादलें । यांत काय हातां आलें ।
देवें जरी ऐसें केलें । तरे काय माती खाती ॥ ३३ ॥
असो आमुची गुरुमाउली । बहुतां आश्रयो झाली ।
क्षेत्र केले गोंदावली । भूवैकुंठ ॥ ३४ ॥
स्वयें घालोन लंगोटी । बहुतांची राखिली पाठी ।
विश्वकुटुंबी होऊन शेवटीं । अलिप्तचि राहिले ॥ ३५ ॥
घरची सर्वही शेती । वाहिली रामचरणाप्रति ।
खरेदी घेवोनि वरती । रामसेवेसी लाविली ॥ ३६ ॥
श्रीराममंदिरें दोन । तैसींच शिवालयें जाण ।
दत्त शनि देवस्थान । संस्थान स्थापिलें ।
पंच नेमून तयावरी । व्यवस्था आंखोन दिली सारी ।
आल्यागेल्यासी भाकरी । अवश्य म्हणती घालावी ॥ ३८ ॥
वरचेवरी सांगती । आम्ही जाऊं आपले पंथीं ।
तुम्ही शीघ्र जोडा रामभक्ति । नातरी पश्चात्‌ ताप पावाल ॥ ३९ ॥
परि कोणा खरें न वाटे । मायापटल आलें मोठें ।
विनोदें वदती ऐसें वाटे । हास्यमुखावरोनी ॥ ४० ॥
असो शके अठराशें पसतीसांत रामनवमी झाली प्राप्त ।
आज्ञापत्रें धाडोनि बहुत । शिष्यसमुदाय मेळविला ॥ ४१ ॥
मार्गशीर्षा नित्यनेमीं । दर्शना गेलों होतों आम्ही ।
’अगत्य यावे रामनवमी’ । आज्ञा ऐसी जाहली ॥ ४२ ॥
’पुढती वेळ कैसी येईल । नैमिषवनीं जाणें घडेल ।
भेटी होईल न होईल । नवमी येण्या विसरूं नये’ ॥ ४३ ॥
काय मायेचा जिव्हाळा । आतां आम्हां आठवला ।
ते समयीं विनोद भासला । मायामोहें ॥ ४४ ॥
असो रामनवमीसी । गेलों आम्ही आज्ञा जैसी ।
तेंचि दर्शन आम्हांसी । अखेरचें जाहलें ॥ ४५ ॥
श्रीरामनवरात्र । अखंड चाले नामसत्र ।
समुदाय भरला सर्वत्र । उतराया ठाव मिळेना ॥ ४६ ॥
चहूं देशींचे लोक येती । भाषाभेद चालीरीती ।
ध्येय एक गुरुमूर्ती । गुरुबंधु एकवटले ॥ ४७ ॥
शास्त्री वैदिक आणि भट । साहेब पंत कवि भाट ।
भिषग्‌रत्नें कुणबी अफाट । नरनारी किती जमले ॥ ४८ ॥
ताशे चौघडे वाजती । रामनामें भक्त गर्जती ।
भजनी दिंड्या अभंग गारी । उत्सव अपूर्व चालिला ॥ ४९ ॥
हरिदास करिती कीर्तन । कोणी वाचिती पुराण ।
कोणी अध्यात्मविवेचन । करिती प्रेमसंवाद ॥ ५० ॥
सद्‌गुरुपूजा सकळ करिती । अपूप नैवेद्य दाविती ।
चरणतीर्थ आदरें घेती । अनन्यभक्तीनें ॥ ५१ ॥
कोणी सुवासिक उटणें । लावोनि न्हाणिलें पंचामृतानें ।
कफनी टोपी झ्र्णावसनें । अर्पिती कोणी गुरूंसी ॥ ५२ ॥
यथाशक्ति धनराशी । कोणी अर्पिती गुरूंसी ।
यात्रा भरली भरती जैशी । रत्नाीकरा चंद्रोदयीं ॥ ५३ ॥
रामजन्मयास । दोन्हीं मंदिरीं दाटी विशेष ।
यास्तव सद्‌गुरु परेश । धर्मशाळेंत बैसले ॥ ५४ ॥
तेथेंच जन्मोत्सव करिती । भक्त तेथें सीतापति ।
तीन ठायीं पाळणे हलती । सद्‌गुरुगृहीं ॥ ५५ ॥
परस्थांची मंदिरीं वसति । ही नेममींचीच पद्धति ।
नवमीचे पारण्याप्रती । गांवभोजन घातलें ॥ ५६ ॥
रात्रौ निघाली मिरवणून । शिबिके बैसले रघुनायक ।
श्रींसी रथीं बैसवोनि देख । अत्यानंदें चालिले ॥ ५७ ॥
सर्वांतरी उत्साह भरला । ऐसा महोत्साह जाहला ।
सद्‌गुरुराजा शोभला । अयोध्ये जैसा श्रीराम ॥ ५८ ॥
कांहीं दिवसांउपरांतीं । अप्पाबुवा श्रींसी वदती ।
’आम्ही जाऊं आतां पुढती । दादा आज्ञा असावी’ ॥ ५९ ॥
अप्पानें ऐसा देह त्यागिला । संत जाणती संतलीला ।
श्रीगुरु निघाले पंढरीला । समुदायासमवेत ॥ ६० ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय अकरावा
समास चवथा

श्रीराममंदिरांत । राहिले सद्‌गुरु समर्थ ।
दिवसेंदिवस क्षीण दिसत । सगुण देह ॥ १ ॥
परि सर्वही व्यापार । अखंड चालिले अनिवार ।
विदेही श्रीगुरुवर । देहबंधन तयां कैचें ॥ २ ॥
गुरुपौर्णिमा समीप आली । भक्तमंडळी येऊं लागेली ।
इकडे आषाढी यात्रा भरली । पंढरीक्षेत्रांत ॥ ३ ॥
गुरुपूजा करावयासी । बहुतेक येती त समयासी ।
उत्साह चालिला अहर्निशी । श्रीरामंदिरांत ॥ ४ ॥
अनंत संत श्रीगुरूंसी । भेटों येती आदरेंसी ।
महाप्रसाद प्रतिदिवशीं । संतांगृही होतसे ॥ ५ ॥
सद्‌गुरूही समस्तांसी । मंदिरीं नेती भोजनासी ।
विठ्ठकृपाछायेसी । संत भेटती आनंदें ॥ ६ ॥
नाम-रूप-भक्तियोग । कोण साधनीं कैसा लाग ।
जीवशिव विवेक वैराग्य । नित्य संवाद चालती ॥ ७ ॥
तुकारामबुवा वलव्हणकर । हे वदती रूप थोर ।
गुरु वदती नाम थोर । साध आन तुळेना ॥ ८ ॥
संवाद चालिला अतिशय । श्रवणीं संतसमुदाय ।
नामरूपीं श्रेष्ठ ध्येय । विवेचन चालिलें ॥ ९ ॥
वेदशास्त्र संतवचनें । काधून दाविती प्रमाणें ।
नाम श्रेष्ठ सद्‌गुरूंनीं । सिद्ध करोनि दाविलें ॥ १० ॥
मायोद्भवीं अक्षर ब्रह्म । सूक्ष्म भूतांचा कर्दम ।
अष्टधें रूपाचा उगम । साकारला दिसे ॥ ११ ॥
वेदांत सिद्धांत धादांत । दावोनि निरसिला किंत ।
परमात्मा नामरूपातीत । नामस्मरणीं आतुडे ॥ १२ ॥
सर्वांची समजूत घातली । बुवांची संमति घेतली ।
भक्तमांदी मिळाली । तो सोहळा अपूर्व ॥ १३ ॥
नामगर्जना करोनी । श्रींचे चरण वंदोनी ।
भक्त गेले स्वसदनीं । संतमहिमा वर्णित ॥ १४ ॥
बहुत शिष्य तेथें आले । ब्रह्मानंद साधु भले ।
भागवतांसी बोलाविले । आणि क बहुतेक ॥ १५ ॥
तैसेंच बहुत शिश्यांप्रति । ज्या त्यापरी उपदेशिती ।
ब्रह्मानंद भेटी एकांतीं । घेते झाले ते समयीं ॥ १६ ॥
बहुत वेळ बोलणें झालें । एकांतीं जावों नये भले ।
महाप्रस्थान निवेदिलें ऐसें वाटे ॥ १७ ॥
जें न देखे रवि । तें पाहे सुज्ञ कवि ।
ऐसें सद्‌गुरु गोसावी । वदलें ते आठवलें ॥ १८ ॥
एकांती प्रयाणाचा । विचार कळला श्रीगुरूंचा ।
लेश न दाविती दुःखाचा । पूर्ण ज्ञानी ब्रह्मानंद ॥ १९ ॥
असो पंढरीवास केला । बहुत काळ सोहळा झाला ।
शिष्यांसमवेत खंडाळीला । गुरुमहाराज निघाले ॥ २० ॥
वझे नामें मामलेदार । विनवणी करिती फार ।
याकारणें गुरुवर । खंडाळीवरूनि चालिले ॥ २१ ॥
तेथेंही बहु उपदेशिती । सकळांसी आनंदविती ।
धन्य साधूची संगती । पुण्यें पुण्य दुणावे ॥ २२ ॥
वाकरीकर लक्ष्मणबुवा । यांची पुण्यतिथी तेव्हां ।
आली, यास्तव शिष्य गांवा । श्रींसी नेत बाकरीं ॥ २३ ॥
सिद्धांचे समाधिस्थान । तेथें कथ्लें संतवर्णन ।
सकलां आनंद देवोन । रामनाम बोधिलें ॥ २४ ॥
हेथें जाती श्रीगुरुराव । तेथें आनंद महोत्साव ।
सकलां वाटे देवाधिदेव । अवतरले मृत्युलोकीं ॥ २५ ॥
नास्तिक दुरोनि निंदिती । परि दर्शन घडतां नम्र होती ।
ऐशी गुरूंची तेजदीप्ति । लखलखीत सोज्ज्वळ ॥ २६ ॥
गुप्त हेर परीक्षूं येती । तेचि चरणीं लीन होती ।
धन्य सज्जनसंगति । दुर्बुद्धी तेथें न रिघे ॥ २७ ॥
जरी बळें झटों आली । तरी मीलनें लीन झाली ।
गंगा बुडवाया निघाली । सागरा जैशी ॥ २८ ॥
असो वाकरीहून निघाले । ते गोंदवलीस आले ।
नागरिकांसे आनंदविलें । वियोग बहुत दिवसांचा ॥ २९ ॥
तंव विनविती कुरवलीकर । दामोदरबुवा भक्त थोर ।
’पहावया राममंदिर । कुरवलीसी चलावें ॥ ३० ॥
आपुली आज्ञा प्रमाण । पंदिर बांधिलें शोभायमान ।
तरी लागावे श्रीगुरुचरण । इच्छा एवढी पुरवावी’ ॥ ३१ ॥
भाव पाहोन रुकार दिला । सकलां वदती जाऊं चला ।
सिद्धस्थान पहावयाला । शंभुक्षेत्रीं ॥ ३२ ॥
सकलांसमवेत निघाले । कुरवलीसमीप आले ।
नगरवासी सामोरे धांवले । सद्‌गुरूंसी आणावया ॥ ३३ ॥
वेशीपासून पंदिरापर्यंत । सडे रांगोळ्या शोभत ।
ओंवाळिती स्त्रिया समस्त । ठायीं ठायीं श्रीगुरूंसी ॥ ३४ ॥
गुलाल बुक्का उधळिती । ’रघुवीर समर्थ’ गर्जती ।
मिरवळून आली मंदिराप्रति । समर्थ सद्‌गुरूंची ॥ ३५ ॥
असो चार दिवसपर्यंत । उत्साह झाला अद्भुत ।
दामोदरबुवा जागती सतत । न्यून नसावें सेवेसी ॥ ३६ ॥
सकलां आनंद देवोनी । स्वारी निघाली स्वसदनीं ।
शिष्य समस्त बोलावूनी । आज्ञापिती ते वेळीं ॥ ३७ ॥
आपआपले ग्रामासी । जावें ये समयासी ।
आम्हीं जाऊं गोंदवलीसी । पुढती यावें दर्शना ॥ ३८ ॥
आधीं पंढरीहून धाडिले । उरलेसुरले येथें जमले ।
येथूनही पाठविले । बहुत जन ॥ ३९ ॥
नित्य जवळीं ज्यांची वसति । तयांसी कार्यें सांगती ।
दूरदेशीं पाथविती । इच्छा श्रीसमर्थांची ॥ ४० ॥
असो कांही लोकां घेवोनी । शीघ्र आले गोंदवलेभुवनीं ।
श्रीरामचरण वंदोनी । भटती महारुद्रासी ॥ ४१ ॥
नागोबाची जत्रा आली । म्हणोन स्वारी निघाली ।
धेनू सोडवून ते काळीं । ’अखेर सेवा ही’ वदती ॥ ४२ ॥
अणीक एक बैल तेथें । विकत घेतला गुरुनाथें ।
लोक विनविती तयांतें । ’वृषभ तुम्न्हीं न घ्यावा ॥ ४३ ॥
हा बहुत खोडगुणी । जेथें जाई तेथें हानि ।
यास्तव श्रीसमर्थांनीं । याचा स्वीकार न करावा’ ॥ ४४ ॥
समर्थ वदती ’अति उत्तम । गरिवासी कष्टवी हा परम ।
आम्ही गोसावी निष्काम । जानि होतां दुःख नसे’ ॥ ४५ ॥
ऐसे म्हणोन बैल घेतला । म्हणती आमचे उपयोगा आला ।
ज्ञानचक्षु सद्‌गुरु भला । करणी करील अघटित ॥ ४६ ॥
दिवाणसाहेब नामें एक । म्हसवडीं होते सांप्रदायिक ।
तयांसी वदती सकौतुक । ’भेट हीच अखेरची’ ॥ ४७ ॥
असो म्हसवडाहून निघाले । शीघ्र गोंदावेली आले ।
सकळांलागीं उपदेशिलें । ’रामनामविसरूं नये ॥ ४८ ॥
आमुची जागा खाली पडली । रामप्रभूची चिठी आली ।
आनंदें निरोप द्या सकळीं’ । हास्यमुखें बोलती ॥ ४९ ॥
सकळां वाटे हें सहज । विनोदें बोलती गुरुराज ।
अज्ञान नेणती काज । समर्थ जाती स्वस्थानीं ॥ ५० ॥
तृणाच्या गंज्या घेतल्या । गायींस गोठणीं घतल्या ।
गुरुआश्रयें शोभल्या । गोकुळीं जैशा ॥ ५१ ॥शके अठराशें पस्तीस । मार्गशीर्ष कृष्णपक्ष ।
भानुवासरी नवमीस । समर्थकार्यें परिसावीं ॥ ५२ ॥
काळे नामें शाळाधिकारी । उतरले मारुतीमंदिरी ।
समर्थांसी नेवोन घरीं महानैवेद्य समर्पिला ॥ ५३ ॥
भूसाहेब केतकर । होते पंक्तीस बरोबर ।
समर्थ वदती चिंतातुर । ’काय इच्छा सांगावी’ ॥ ५४ ॥
साहेब विनविती समर्थांसी । ’देह पडावा चरनापाशीं ।
येवढीच इच्छा आम्हांसी । आळी’ समर्थें प्रवावी’ ॥ ५५ ॥
समर्थ वदती ऐसें कांहीं । होणेंचा योग नाहीं ।
जाणें आम्हां लवलाहीं । तुम्ही पुढती याल’ ॥ ५६ ॥
ऐसें वदोन मंदिरीं आले । खोलींत जावोन बैसले ।
तंव बाहेर भांडूं लागले । आंताजीपंत आणि काका । ५७ ॥
समर्थें दोघां बोलावूनि । ’कां झगडा रामसदनीं’ ।
वदतां करिती विनवणी । ’आपण नसतां ऐसें होतें’ ॥ ५८ ॥
समर्थ वदती सकौतुक । ’आम्ही कोठे उदईक ।
असेल तें मानोनि सुख । रामप्रसाद सेवावा’ ॥ ५९ ॥
आउताईस बोलाविती । म्हणती ’सांगा सकलांप्रति ।
भात गेला गांवाप्रती । भाजीभाकर सुखें खावी’ ॥ ६० ॥
असो सायंकाळसमयास । स्वारी आली गोशाळेस ।
बैसोन सुखासनास । म्हणती ’हे स्थान रम्य पवित्र ॥ ६१ ॥
येथें जागा सारवावी । रांगोळी सुंदर घालावी’ ।
तैसें करवून भक्तांकरवीं । वरी आपण बैसले ॥ ६२ ॥
भवानरावासी पाचारिलें । ’येथें गाईंचें गवत पडले ।
उदईक येऊं तों वहिलें । तुम्ही रहा वसतीसी’ ॥ ६३ ॥
तैसेचि गोषाळेचे कारकून । तयां खडावा देऊन ।
’आम्ही येऊं तोंवरी जतन । करीत येथें बैसावें’ ॥ ६४ ॥
ऐसें वदोन सत्वर । मंदिरी आले गुरुवर ।
आप्पा नामें जरंडीकर । पाचारिलें तयासी ॥ ६५ ॥
’काय निमित्त उपोषण । केलें तुम्हीं दिवस तीन’ ।
आप्पा वदे ’समर्थांलागोन । प्रकृतीस स्वास्थ्य असावें’ ॥ ६६ ॥
समर्थ वदती ते अवसरीं । ’माझी प्रकृती उदईक बरी ।
होईल तूं चिंता न करीं’ । आग्रहें भोजना बैसविती ॥ ६७ ॥
असो रात्री भजन अति केलें । निर्वाण अभंग गाईले ।
भक्त उदासीन झाले । संशय वाटे सकळांसी ॥ ६८ ॥
रात्रीं करोन प्रेमळ भजन । उपदेशिती सकळांलागोन ।
’सतत करा नामस्मरण । गुरुवचनीं भाव धरा ॥ ६९ ॥
नामपाथ ज्याचे वैखरी । नित्य आम्ही त्याचे अ।अन्तरीं ।
सदा साह्य श्रीहरी । विश्वास धरा निश्चयें ॥ ७० ॥
ऐसा करोनि उपदेश । आळविले अयोध्याधीश ।
अश्रु आले नयनास । श्रीरामप्रभूच्या ॥ ७१ ॥
तें द्द्व-भक्तांचें प्रेम । कोण वर्णील निरुपम ।
अवाप्तकामासी सकाम । व्हावया लाविती भक्त ॥ ७२ ॥
बहुतांपरी सगुन भजन । करोनि केलें शयन ।
शिष्य समस्त उद्विग्न । गति बरवि दिसेना ॥ ७३ ॥
पहांटे पान्च घटीसी । करिती शौचमुखमार्जनासी ।
श्रीगुरु वदती अम्मासी । ’आजची सेवा अखेरची’ ॥ ७४ ॥
राममंदिरी जावोनी । पुढती आसन घालोनी ।
सकलां वदती ;उच्च स्वरांनीं । भजन करावें; ॥ ७५ ॥
भजन कराया लावोन । समाधि लाविली आपण ।
ब्रह्मांडभेद करोन । ज्योत मिळविली रामरूपीं ॥ ७६ ॥
दुःखाचा कडॆलोट झाला / येकमेका/म्चे [अडती गळां ।
वंदन करिती बेळोवेळां । गुरुचरणांसी ॥ ७७ ॥
’आम्हां अर्भकां टाकोन । कां बैसलांत रुसोन ।
कृपा करोन सोडा मौन । प्रेमसंभाषण करावें ॥ ७८ ॥
आम्ही बालकें अज्ञान । तूं माय सदय सघन ।
आम्ही अनंत अपराधी दीन । कोठें जासी त्यजोनी ॥ ७९ ॥
काय आमुचें दुर्भाग्य । गुरुचरणांचा वियोग ।
घडला, आतां तगमग । वारील कोण’ ॥ ८० ॥
असो ऐसा बहुत शोक । करिते झाले सकळ लोक ।
प्रेम जिव्हाळा आत्यंतिक । गुरुमायेचा ॥ ८१ ॥
आज ब्रह्मानंद असते जरी । तरी व्यवस्था करिते सारी ।
शिष्य तेचि अधिकारी । म्हणती सर्व ॥ ८२ ॥
ते येईपर्यंत । देह ठेवावा तीन रात ।
ऐसें थरोनि एकमत । तारा धाडिल्या चहूंकडे ॥ ८३ ॥
परि त्यांचा पत्ता नाहीं । पूर्वींच ठरलें सर्वही ।
प्रत्युत्तर न ये कोठेंही । मग चिंता प्रवर्तली ॥ ८४ ॥
ते दिवशीं ग्रामस्थांनीं । सकल कर्में सांडोनी ।
सद्‌गुरुसन्निध उपोषणीं । राहिले अश्रु ढाळित ॥ ८५ ॥
आणिक नित्य यात्रे येती । तयांसी अडथळे मार्गावरती ।
नाना प्रकारें होऊन राहती । इच्छा श्रीसमर्थांची ॥ ८६ ॥
परस्थ कोणी येत नाहीं । देह पल्लवी ठेविला पाहीं ।
दृश्य दृश्यत्वें जाय विलयीं । यास्तव दहन करावें ॥ ८७ ॥
एकादशीस ऐसा विचार । ठरला सर्वानुमतें साचार ।
तंव नवमीचा प्रकार । आठवला तेसमयी ॥ ८८ ॥
गोठणीं भवानराव यासी । कथिलें येईन वसतीसी ।
तैसेंचि देती पादुकांसी । पंतोजीजवळी ॥ ८९ ॥
स्थान सारवोन स्वच्छ केलें । रांगोळ्या घालोन वरी बैसले ।
;विश्रांती घ्यावया वहिलें । स्थान असे पवित्र’ ॥ ९० ॥
ऐसें वदले तें आठवलें । म्हणोनि तेंचि दहनस्थान ठरविलें ।
विमान करोन श्रृंगारिलें । मूर्तिं भीतरी बैसविली ॥ ९१ ॥
तेज फांकले चहूं दिशी । हनुमानरूपें भक्तांसी ।
दर्शन दिधलें ते समयासी । इतरां सतेज सचेतन ॥ ९२ ॥
प्रचंड नामगजरांत । मिरवणूक आली गोठणाप्रत ।
पुनरपि स्थान शोभिवंत । केलें सडे घालोनी ॥ ९३ ॥
गोमतेचें मूत्र । मुरोनि आधींच पवित्र ।
बहुत दिवस केलें क्षेत्र । सद्‌गुरुसमर्थांनी ॥ ९४ ॥
कर्पूर बिल्व आणि चंदन । तुळशीकाष्ठें केलें दहन ।
सगुणाकृति लया पावोन । जगदाकार जाहली ॥ ९५ ॥
दृश्य दृश्यामाजीं दडलें । व्यापकत्वें जगती भरले ।
निर्गुण आलें ना गेलें । अखंड भरलें गुरुरूप ॥ ९६ ॥
भाविकांचे भावनेसाठीं । सगुण साक्षात्‌ देती भेटी ।
बहुतां दृष्टांती कथिती । ’आम्ही असों येथेंचि’ ॥ ९७ ॥
ज्ञानियां आले ना गेले । भाविकां अंतरी भरले ।
अज्ञानियां दृश्य झाले । समाधिरूपें ॥ ९८ ॥
असो गोंदवलींचे चैतन्य । अदृश्य जाहलें येथून ।
उत्तरचरित्र जें गहन । परिसा पुढील अध्यायीं ॥ ९९ ॥
श्रींचा दासानुदास । कथितसे चरित्रास ।
निमित्तमात्र करूनि त्यास । त्याचा तोचि वदविता ॥ १०० ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवनीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रमदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ १०१ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥
॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय बारावा
समास पहिला

समाधी पहातां समाधान होतें । तनूं कष्टवी त्यासि आनंद देते ॥
मनीं भावितां कामना पूर्ण होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १२ ॥

जयजय सद्‌गुरु पूर्णब्रह्मा । विश्वचालका निष्कामा ।
विश्वात्मय चित्सुखधामा । निर्विकारा सद्वस्तु ॥ १ ॥
सजीव निर्जीव दोहीं ठायीं । अंतर्बाह्य व्यापून राही ।
अलिप्त अखंड भेद नाही । निराकारा निरुपमा ॥ २ ॥
प्रकृतिपुरुषांचा सोहळा । मायोद्भनव ब्रह्मांडगोळा ।
अहंकार वासना जिव्हाळा । व्यापून वेगळा तूं येक ॥ ३ ॥
आदि-मध्य-अंत रहित । सर्वव्यापि सकळातीत ।
रंग-रूप-कल्पनातीत । सद्‌गुरुपद स्वयंप्रभ ॥ ४ ॥
मनें शोधितां उन्मत्त झाले । बुद्धीचा निश्चय डळमळे ।
चित्त दृश्य चिंतूं लागले । गुरुपद अदृश्य ॥ ५ ॥
वेदशास्त्रें कशिली कंबर । उपनिषदें वदती आम्ही चतुर ।
शोधूं निघाली परात्पर । ज्ञानमदेंकरोनी ॥ ६ ॥
पूर्वपक्ष उत्तरपक्ष । करितां पडला शेष ।
अलक्षीं लावूं वदती लक्ष । परि सिद्धांत होईना ॥ ७ ॥
शब्दजननीं ॐकार । तेथेंचि ते जाहले स्थिर ।
एवं शब्दांचे विचार । श्ब्दब्रह्मीं मावळले ॥ ८ ॥
वायूनें शोधितां आकाश । तो स्वयेंचि पावला नाश ।
तैसें शोधितां निःशब्दास । शब्द नाश पावले ॥ ९ ॥
बर्फ बोले आपुली प्रौढी । सागरीं देवोनिया बुडी ।
आणीन मी रत्नेंी गाढीं । क्षण स्थिर रहावें ॥ १० ॥
ऐसें वदोन सागरीं गेला । तंवर वरतीच तरंगोनि विराला ।
पुन्हां वार्ता सांगावयाला । आला नाहीं रत्नां॥ची ॥ ११ ॥
ऐशी स्वरूपओळखण । जवळी असोन चुकले जन ।
ज्ञानाज्ञान द्वैतभान । गुंतले देवा ऐलीकडे ॥ १२ ॥
शाश्वतपद चित्तीं धरिले । ज्यांचे द्वैतभान हारपलें ।
सद्‌गुरु भेटतांच जाहले । सद्‌गुरुरूप ॥ १३ ॥
निजस्वरूप ओळखण । तेंचि तुमचें कृपादान ।
सदानिकट सुप्रसन्न । परि पाहणें जड वाटे ॥ १४ ॥
पाहों जातां दूर नाही । विचार करितां दुजें नाहीं ।
मानीव पडळ जीव कांहीं । मानिलें तें सोडीना ॥ १५ ॥
असत्याचा ऐसा स्वभाव । असत्य सामग्री हावभाव ।
असत्य काळ बोलणें वाव । असत्य असत्या जमवीतसे ॥ १६ ॥
जैसा नट नाट्यागारीं । असत्य क्रिया करी सारी ।
पुरुष असोनिया नारी । भासवोन मोही बहुतांसी ॥ १७ ॥
अमावस्ये चंद्रकिरण । चेतवी तयाचा मदन ।
रात्रीं प्रखर सूर्यकिरण । ताप देती तयासी ॥ १८ ॥
घराचें जाहलें रान । उजेडीं अंधार पडला दारुण ।
सभेसी तस्कर येवोन । चोरी करी येकांती ॥ १९ ॥
पाहणार मानिलें पाषाण । म्हणे हें निर्मनुष्य कानन ।
कृत्रिम व्याघ्र येवोन । झडप घाली तयावरी ॥ २० ॥
ऐसें असत्य कौतुक । जाणती सकळ प्रेक्षक ।
परि गोडी लागली अधिक । असत्य प्रिय असत्या ॥ २१ ॥
तैसें आम्हीं द्वैत मानिलें । अहंकारें वेगळें केलें ।
म्हणोनि अदृश्य जाहलें । तुमचें स्वरूप अज्ञानें ॥ २२ ॥
आतां हीच विनवणी । द्वैताची काढोन गवसणी ।
स्वस्वरूप दावीं झणीं । कृपाळुवा गुरुमूर्ते ॥ २३ ॥
कोसला कोंडी आपुला प्राण । स्वयेंचि कोश करोन ।
तैसें आम्हीं संसारबंधन । अनंतजन्मी बांधिलें ॥ २४ ॥
सकळ व्यसनांमाजीं व्यसन । संसार हें महाव्यसन ।
सभाग्या दास करोन । दारोदार हिंडवितें ॥ २५ ॥
अन्य व्यसन सुटे एक जन्मीं । हें न सुटे जन्मोजन्मीं ।
इतराची कांहीं काल ऊर्मी । याची ऊर्मी सुटेना ॥ २६ ॥
इतरां निंद्य मानिती । यासी सभाग्यांमाजीं गणती ।
तेणें विशेष आसक्ती । चढतें बंधन मानवा ॥ २७ ॥
ऐसें हें कोशबंधन । बांधिलें सुखेच्छा धरून ।
परि शेवटीं कोंडोनि प्राण । इहपर नाश करेल ॥ २८ ॥
पंचविषय देहासक्ति । ही संसारशब्दव्याप्ति ।
आणिक लक्षणें बहुत ग्रंथी । बहुतां प्रकारें बोलिलीं ॥ २९ ॥
ऐसी संसारगवसणी । तीमाजीं कोंडले स्वतंत्र प्राणी ।
नरदेह छिद्रामधोनी । तुजला हांका मारितसे ॥ ३० ॥
धांवोन येईं सत्वरी । अज्ञानग्रंथी मुक्त करीं ।
बाहेरी येवोन चरणांवरी । लोळेन सगुणसाक्षित्वें ॥ ३१ ॥
भज्य भजक आणि भजन । हें सगुणींच लाभे धन ।
भक्तिसोहळा आनंदपूर्ण । अनंतजन्मीं भोगावा ॥ ३२ ॥
परि व्हाया सगुणसेवा । मोकली गा वासनागोवा ।
मग आनंदाचा मेवा । चाखितां रोगभय नाहीं ॥ ३३ ॥
गुरुसेवा नाही घडली । बहुत शिष्यीं बहुत केली ।
आम्हां अल्पकाळींच मुकली । सगुणब्रह्म गुरुमूर्ति ॥ ३४ ॥
अज्ञानियां अदृश्य झालें । भाविकां भावनेनें दिसलें ।
ज्ञानियां आलें ना गेलें । सद्‌गुरुपद शाश्वत ॥ ३५ ॥
उपासकां उपासनेलागीं । समधीरूप नटले योगी ।
अनंत कामना पुरविती वेगीं । साक्षात्कारें सेवकां ॥ ३६ ॥
ती कथा कैसी झाली । वदाल नाही परिसिली ।
तरी वंदोनि गुरुमाउली । गुरुप्रसाद कथन करूं ॥ ३७ ॥
शके अठराशें पस्तीस । मार्गशीर्ष कृष्णपक्ष ।
नवम्योत्तर दशमीस । सतेज भानु मावळला ॥ ३८ ॥
रविसोमसंधि वार । रवि‍उदयापूर्वीं घडीभर ।
समाधिस्थ झाले गुरुवर । योगनिद्रा घेतली ॥ ३९ ॥ ब्रह्मानंदांची वाट पाहिली । मग गोठणीं चिता सिद्ध केली ।
विमानीं मूर्ति बैसविली । पूजा आरत्या करोनी ॥ ४० ॥
रामनामगजर करिती । बुक्का सुमनें उधळिती ।
तुळशीमाळा कंठी घालिती । नमन करिती वेळोवेळां ॥ ४१ ॥
जेव्हां बलभीमरूप देखिलें । तेव्हां भक्त आनंदले ।
शोक आल्हाद एके वेळे । नांदतसे गुरुक्षेत्री ॥ ४२ ॥
एकादशी भौमवारीं । गोठणीं राहिली स्वारी ।
पंचभूतांची सामग्री । पंचभूतीं मेळविली ॥ ४३ ॥
केळीचे खुंट बांधिले । दहनस्थान सुशोभित केले ।
गोमयें सडे सिंचिले । रांगोळ्या गुलाल घालिती ॥ ४४ ॥
आप्तसंबंधी श्रींचे । चुलतबंधु श्रीपती हस्तें त्यांचे ।
वेदोक्त अंत्यविधीचें । कार्य करविलें ॥ ४५ ॥
चितेसी दिधला अग्न । तंव भवानराव नामेंकरून ।
भक्त होते भावसंपन्न । उडी घेऊं धांवती ॥ ४६ ॥
बहुतीं तया आवरिला । दुःखाचा कडेलोट झाला ।
गोंदवल्याचा आत्मा गेला । सोडोनि आम्हां दीनांसी ॥ ४७ ॥
चहूंदेशी पसरली मात । धांवोन येती गुरुभक्त ।
अंतयोग किं निमित्त । केला वदती गुरुरायें ॥ ४८ ॥
अप्पासाहेब भडगांवकर । आले सोडून पंढरपूर ।
गुरुचरणीं भाव थोर । दुःखी अत्यंत जाहले ॥ ४९ ॥
ते दिवसापासोनि । व्यवस्था सर्व केली त्यांनी ।
यात्रा भरली गुरुभुवनीं । नामगजर अखंड ॥ ५० ॥
तिसरे दिवशीं रक्षा भरणें । करिती सर्वही दुःखानें ।
आईसाहेब यांची कंकणे । निघालीं पूर्वींसारखीं ॥ ५१ ॥
चतुर्दश दिनपर्यंत । अखंड नामगजर होत ।
अन्नसंतर्पण वेदोक्त । विधि सर्व सांग केला ॥ ५२ ॥
समाधीचे तिसरे दिवशीं । कांही वैश्य तेलंगण देशी ।
आले अनुग्रह घ्यावयासी । तों विपरीत देखलें ॥ ५३ ॥
धाय मोकलोन रडों लागले । ’संतसज्जनीं अव्हेरिलें ।
आमुचें भाग्य नाहीं उदेले । आतां आम्हां गति कैसी ॥ ५४ ॥
आम्ही सत्य प्रारब्धहीन । माय गेली आम्हां त्यजून’ ।
समजाविती समस्त जन । स्थिर रहा म्हणोनी ॥ ५५ ॥
ब्रह्मानंद शीघ्र येतील । तुम्हां अनुग्रह करतील ।
गुरुरूप ज्ञाते सखोल । पूर्ण अधिकारी’ ॥ ५६ ॥
ऐसें तयांसी कथिलें । ’हो, जी’ म्हणोनि राहिले ।
रात्रीं तेथें अभिनव घडलें । तें परिसा सज्जनहो । ५७ ॥
पहांटे सर्वांसी दृष्टांती । दर्शन देत गुरुमूर्ति ।
’ब्रह्मानंद शीघ्र न येती । मीच देतों अनुग्रह’ ॥ ५८ ॥
संकल्प पूजा करवोन । अनुग्रह दिधला तयांलागोन ।
सर्वांचे आनंदलें मन । वारंवार वंदिती ॥ ५९ ॥
तुमचा कार्यभाग झाला । जावें वदती स्वस्थानाला ।
तैसीच जपासाठीं माला । प्रत्यक्ष तेथें ठेविली ॥ ६० ॥
प्रातःकाळी उठोन वदती । ’आम्हीं देखिली गुरुमूर्ति’ ।
एकमेकांसी तेंचि कथिती । ’मज अनुग्रह दिधला सद्‌गुरूंनी’ ॥ ६१ ॥
वृद्धा सांगे वृत्तांत । ’स्वप्नीं माळा मजप्रत ।
दिधली’ ती पुढ्यांत । प्रत्यक्ष पाहोन आनंदती ॥ ६२ ॥
ऐसा घडला चमत्कार । पाहों येती नारीनर ।
नमन करिती वारंवार । गुरुप्रसादमाळेसी ॥ ६३ ॥
आणिक बहुतां दृष्टांत । जाहले ’मी येथें सत्य ।
मानूं नका मनीं किंत । भाव तैसा भेटेन ॥ ६४ ॥
माझे आज्ञेनुसार चालतां । जवळचि असें मी सर्वथा ।
अज्ञानापरी शोक करितां । यास काय म्हणावें’ ॥ ६५ ॥
ऐसे बहुतां निरोपिलें । तेंचि आम्हीं अनुभविलें ।
समाधी पाहतांच झालें । परम समाधान ॥ ६६ ॥
संकटीं दृष्टांतें बोधिती । अपरोक्षपणें साह्य करिती ।
भाविकापाशीं नित्य वसति । सद्‌गुरुमहाराजांची ॥ ६७ ॥
असो दहनाचे तिसरे दिवशीं । काढोनि ठेविलें अस्थींसी ।
रक्षा माहुली संगमासी । न्यावया भरोनि ठेविली ॥ ६८ ॥
इकडे लोकव्यवहारकारण । नित्य देती पिंडदान ।
मुक्तासी कैचें बंधन । आधींच त्रैलोक्य जिंकिलें ॥ ६९ ॥
परि समर्थांची शिकवण ऐसी । सिद्ध असोन साधनासी ।
आदरें करिती जिवानिशीं । वदती व्यवहार न सांडावा ॥ ७० ॥
तोचि क्रम करिती येथ । क्रिया करिती वेदोक्त ।
दशमदिनीं भागवत । आले संत गुरुक्षेत्रीं ॥ ७१ ॥
ज्ञानदाता पित्यासमान । बहुतीं मानूनियां जाण ।
ते दिनीं करिती मुंडण । मायबाप गुरुराव ॥ ७२ ॥
ऐसा चतुर्दश दिनपर्यंत । उच्छाह केला अपूर्व बहुत ।
पादुका स्थापोन तेथ । उपासना चालविती ॥ ७३ ॥
गोप्रदानें धनदानें । अन्नदानें वस्त्रदानें ।
करिती विप्रांची पूजनें । गुरुरूप मानोनी ॥ ७४ ॥
कोणी तेथे लोळण घेती । विभूति अंगी लाविती ।
पूजाअर्चा समग्र करिती । कोणी घालिती प्रदक्षिणा ॥ ७५ ॥
येणेंपरी गुरुमाउली । समाधिरूप दृश्य नटली ।
अखंडत्वें असे भरली । अंतर्बाह्य व्यापक ॥ ७६ ॥
आतां मागील व्यवस्था । पुढील समासीं येईल कथा ।
श्रोतीं स्थिर करोनि चित्ता । अमृतपान करावें ॥ ७७ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय बारावा
समास दुसरा

इकडे ब्रह्मानंदांनीं । गुरुआज्ञा आणोनि ध्यानी ।
न येती गुरुसदनी । तेथेंचि उच्छाह मांडिला ॥ १ ॥
व्यंकटापूर मंदिरांत । नामसप्ताह उभारित ।
दातृत्वासी नाहीं मित । याचक बहु तोषविले ॥ २ ॥
ते सिद्ध ज्ञानी विरक्त । परमप्रतापी गुरुपुत्र ।
वियोग न शिवे तेथ । अनन्य भक्त सच्छिष्य ॥ ३ ॥
गोप्रदानें धनदाने । नाना अन्नसंतर्पणें ।
नाना उपदेशवचनें । अनंत जीव शांतविती ॥ ४ ॥
इकडे गोंदवल्याची स्थिति । परिसा चालली कैशा रीति ।
राम-दत्त-मंदिराप्रति । सेवा कैसी चालली ॥ ५ ॥
समर्थें आधीं एक संवत्सर । यथाविधि नेमले मुखत्यार ।
जमिनी वांटल्या सत्वर । राम दत्त शनीकडे ॥ ६ ॥
कांही जमीन कुटुंबासी । ठेविली असे निर्वाहासी ।
बाकी सर्व अधिकार पंचांसी । आपुलेपरी दिधले ॥ ७ ॥
पंच परिसावे चतुर । ब्रह्मानंद भक्त थोर ।
आप्पासाहेब भडगांवकर । साठये आणि त्यात्याराव ॥ ८ ॥
थोरले राममंदिरांत । पुजारी गोपाळराव अद्वैत ।
धाकटे मंदिरीं मेहुण्याप्रत । रामसेवा सांगितली ॥ ९ ॥
दत्त आणि श्रीशनीश्वर । येथील पूजाधिकार ।
बाळंभट्ट कुरवलीकर । यांसी दिधले गुरुरायें ॥ १० ॥
नित्यनेम पूजाविधान । आल्या अतिथा अन्नदान ।
यथाशक्ति समर्पून । रामसंस्थान चालवावें ॥ ११ ॥
ऐसी व्यवस्था गोंदावलीसी । पंचांमार्फत केली खाशी ।
कोणी करील कुचराईसी । तरी दुजा नेमावा ॥ १२ ॥
जैसा देश तैसा वेश । म्हणोनि लेख विशेष ।
येरवीं त्रिकाळ सत्ताधीश । सद्‌गुरु अंतर्बाह्य ॥ १३ ॥
इकडे समाधिस्थानावरती । भवानराव व्यवस्था पाहती ।
जतन करोनि अस्थि । उपासना चालविली ॥ १४ ॥
अस्थि न्यावया प्रयागासी । मागों जातां तयांपासीं ।
न देती अहर्निशीं । प्राणापरी सांभाळिती ॥ १५ ॥
तंव ब्रह्मानंद यांनी । पत्र दिधलें लिहोनी ।
’हरिभाऊ हरिदास यांनीं । अस्थि न्याव्या प्रयागीं’ ॥ १६ ॥
पत्र दावितां भवानरावांसी । निमूट देती अस्थींसी ।
घेऊन चालले प्रयागासी । हरिभाऊ गुरुभक्त ॥ १७ ॥
पंतोजी येरळवाडीकर । हेही निघाले बरोबर ।
तंव पत्र देती जालनेकर । तोही प्रकार परिसावा ॥ १८ ॥
आनंदसागर महाभक्त । श्रींचे आधीं देह ठेवत ।
घेवोनि त्यांचे अस्थींप्रत । गंगास्नाना निघाले होते ॥ १९ ॥
मार्गीं हर्द्यासी महाराज- । दर्शना अनुज्ञें गेले सहज ।
तंव वदले सद्‌गुरुमहाराज । ’अस्थि येथेंच ठेवाव्या ॥ २० ॥
आम्ही जाऊं नंतरे । तेव्हां नेऊं गंगेउदरीं ।
म्हणोनि कपाटभीतरीं । स्वहस्तें अस्थि ठेविल्या ॥ २१ ॥
या‍उपरि समर्थ कांहीं । हर्द्यासी पुन्हां गेले नाहीं ।
योग दिसे ऐसाचि पाहीं । अस्थिसंगें अस्थि न्याव्या ॥ २२ ॥
समर्थ निघाले स्नानासी । मुक्काम जाहला हर्द्यासी ।
संगें घेवोनि सच्छिष्यासी । मार्ग क्रमिते जाहले ॥ २३ ॥
जालना मठींचे पत्र आलें । तैसें हर्द्यासी उतरले ।
जेथें गुरुआज्ञें होते राहिले । भैय्यासाहेब इंदुरकर ॥ २४ ॥
मागें श्रीगुरुआज्ञापिती । ’आम्हीं येऊं पुढती ।
तंववरी येथेंचि रहा निश्चितीं । रामसेवा करोनी’ ॥ २५ ॥
विष्णुबुवा कुंभोजकर । हेही आले सत्वर ।
अस्थि गेऊनि सपरिवार । त्रिवेणीसी चालले ॥ २७ ॥
मसुरियादीन शिवमंगल । उपाध्ये श्रींचे तेथील ।
अस्थि घेऊन भक्तमंडळ । पावलें तया ठायीं ॥ २८ ॥
बाबूभट्ट काशीकर । पटाईत मावशी भाविक चतुर ।
आल्या ताई इंदुरकर । अस्थिविसर्जनाकारणें ॥ २९ ॥
आणिकही भक्त बहुत येती । कांहीं केली उपपत्ती ।
नामगजरें दोन्ही अस्थि । त्रिवेणीसंगमीं मेळविल्या ॥ ३० ॥
द्रव्यदानें गोप्रदानें । दिधली भक्त मंडळीनें ।
नानापरीनें स्तवनें । मुखीं गाती समर्थांचीं ॥ ३१ ॥
असो हरिभक्त हरिदास यांनीं । अस्थि विसर्जन करोनी ।
निघाले शीघ्र तेथोनी । गुरुभुवनीं यावया ॥ ३२ ॥
इकडे माहुलीसंगमाप्रत । रक्षा पोंचवावी हा हेत ।
धरोनि निघाले भक्त । भडगांवकर आदिकरोनी ॥ ३३ ॥
अण्णासाहेब घाणेकर । श्रीगुरूंचे भक्त थोर ।
बाबासाहेब दांडेकर । इत्यादि भक्त निघाले ॥ ३४ ॥
माहुली पवित्र संगमस्थानी । रक्षा दिधली सोडूनी ।
सवेंचि निघाले तेथूनी । सज्जनगडीं पावले ॥ ३५ ॥
तेथील समर्थसमाधी । पाहतां हरल्या मनोव्याधी ।
ऐसीचि श्रींची समाधी । बांधूं ऐसें योजिती ॥ ३६ ॥
दर्शन घेवोन परतले । मनीं चिंतिती पाउलें ।
बहुत उदासीन झाले । संतसंगतीवियोगें ॥ ३७ ॥
प्रयाग माहुलीसी जन । आले कार्यें करून ।
मनी ध्याती श्रीगुरुचरण । वियोगदुःख अनिवार ॥। ३८ ॥
ब्रह्मानंद सच्छिष्य । आले रामनवमीस ।
उत्साह दहा दिवस । आनंदीआनंद बहु केला ॥ ३९ ॥
बोध करूनी सकळांसी । वदती ’समर्थ नसती दूरदेशी ।
प्रकट गुप्त भेदासी । दुजा भेद असेना ॥ ४० ॥गुरुआज्ञा जे मानिती । वचनीं विश्वास ठेविती ।
साधनीं देह झिजविती । तयां पूर्वींसारिखे ॥ ४१ ॥
तयांसी घडे दर्शन । तयांसवें संभाषण ।
नाना संकटी धांवोन । पाठींपोटीं रक्षिती ॥ ४२ ॥
सद्‌गुरु त्रिकाळ शाश्वत । ये विषयीं न धरावा किंत ।
भाव ठेवाल तैसा हेत । पुरेल जाणा निश्चयें ॥ ४३ ॥
जेथ भाविक सच्छिष्य । तये ठायीं अखंड वास ।
गोंदावलीं नित्य प्रत्यक्ष । समाधिठायीं वास करिती ॥ ४४ ॥
याची पहावी प्रचीति । समाधि घेतल्यावरती ।
तैलंगणचे लोकांप्रति । अनुग्रहमाला दिधली असे ॥ ४५ ॥
कित्येकांसी दृष्टांत झाले । कित्येकां प्रत्यक्ष भेटले ।
कित्येकांसी आज्ञापिलें । साधनमार्ग साधाया ॥ ४६ ॥
समाधीची सेवा करितां । पुरविती भाविकांचे आर्ता ।
रामनाम मुखीं गातां । हृदयीं वास प्रत्यक्ष ॥ ४७ ॥
वारंवार वदत होते । सगुण जाईल विलयातें ।
शाश्वत सद्‌गुरुपदातें । दृढ ध्यानीं धरावें ॥ ४८ ॥
येथें आळस ज्यानें केला । तया वियोग भासला ।
आज्ञाधारकांसी भरला । अंतर्बाह्य सद्‌गुरु ॥ ४९ ॥
तुम्ही श्रींचे सच्छिष्य । विवेकी ज्ञानी विशेष ।
तरी शोकें न व्हा उदास । अज्ञानियांसारिखे ॥ ५० ॥
गुरुचरणीं भाव धरा । अखंड नाम पीयुष झरा ।
सेवितां वियोग न स्मरा । क्षणार्धही माउलीचा’ ॥ ५१ ॥
असो ऐसें बोधून सकळां । दुःखभार दूर केला ।
मग पुढील कार्याला । आंखोन देती ॥ ५२ ॥
आप्पासाहेब भडगांवकर । दुजे दामले भाविक चतुर ।
यांसी नेमून मुखत्यार । समाधिसेवा चालविली ॥ ५३ ॥
सज्जनगडीं जैशा रीती । भूगर्भीं श्रींची वसति ।
वरती ठाण रघुपती । ध्यान शोभे साजिरें ॥ ५४ ॥
तैसेंचि गोठणी सुंदर । दहनस्थानीं काढिलें विवर ।
पाया भरोनि सत्वर । चिरेबंदी बांधिलें ॥ ५५ ॥
दूरदेशींचे पाषाण । आणिले शुभ्र शोभायमान ।
मृदुत्वें दुजे दर्पण । चित्रविचित्र रंगाचे ॥ ५६ ॥
मुंबापुरीहून सिंहासन । घाणेकर देती करवोन ।
श्रीभागवत कुर्तकोटीहून । पादुका आणविती ॥ ५७ ॥
पूर्वींच श्रींचे आज्ञेवरोनी । करविल्या होत्या भागवत यांनीं ।
सुशोभित नागभूषणीं । चित्त वेधिती सकलांचे ॥ ५८ ॥
असो श्रीब्रह्मानंद । साहित्य जमविती शुद्ध ।
कारागीर आणवोनि प्रसिद्ध । समाधिस्थान शोभविलें ॥ ५९ ॥
शके अठराशें छत्तिसांत । मार्गशीर्ष कृष्णपक्षांत ।
प्रतिपदीं शुभमुहूर्त । वेदोक्त पादुका स्थापिल्या ॥ ६० ॥
विद्वान्‌ सत्त्वस्थ ब्राह्मण । आणविले देशोदेशींहून ।
वेदोक्त विधिविधान । आणिक प्रचंड नामगजर ॥ ६१ ॥
जे स्वानंदसुखाचे भोक्ते । ब्रह्मानंद स्थिपिती स्वहस्तें ।
अनंत भावना एकचित्तें । गुरुरूपें दृढ झाल्या ॥ ६२ ॥
गोमयें स्थान शुद्ध केलें । वरी श्री शोभविले ।
ब्रह्मानंदी प्रकट केले । वेदोक्त भक्तिमार्गानें ॥ ६३ ॥
अनंत जीवांच्या यातना । हरती घडलिया दर्शना ।
समाधी पाहातां समाधाना । वरितें मन ॥ ६४ ॥
प्रत्यक्ष नांदे गुरुराव । किती वर्णूं मी वैभव ।
समक्ष पहावा अनुभव । विकल्परहित भावनेनें ॥ ६५ ॥
असो प्रतिपदेपासोनि । उच्छाह पुण्यतिथीदिनीं ।
दशमी दिधला नेमोनी । ब्रह्मानंदसाधुवरें ॥ ६६ ॥
नामस्मरण अन्नदान । पुराण कीर्तन आणि भजन ।
पादुका शिबिकारोहण । मिरवणूक रामभेटीं ॥ ६७ ॥
दहा दिवसपर्यंत । उच्छाह नामगजरांत ।
चहूं देशींचे येती भक्त । गुरुपदीं नत व्हाया ॥ ६८ ॥
’श्रीसमर्थ संस्थान गोंदवलें’ । हें संस्थेचें नाम ठेविलें ।
सुज्ञ पंच नेमियेले । ब्रह्मानंद सिद्धांनी ॥ ६९ ॥
दामले आणि भडगांवकर । श्रींचा प्रसाद तयांवर ।
अंतरीं राहोनि गुरुवर । कार्यभाग चालविती ॥ ७० ॥
लोकसंग्रही कार्यकर्ते । अति लीन गुरुपदातें ।
साधनीं दक्ष जे निरुते । गुरुभक्त पुढारी ॥ ७१ ॥
समाधी प्रथम संवत्सरीं । श्रीब्रह्मानंद यांची स्वारी ।
स्वयें करोन चाकरी । मार्ग आंखोन ठेविला ॥ ७२ ॥
तैसाचि चालिला परिपाठ । नाम भेदी स्वर्गकपाट ।
अन्नसंतर्पण अफाट । देव प्रसाद वांच्छिती ॥ ७३ ॥
देशोदेशींचे गुरुभक्त । साधक सिद्ध पंडित ।
वैदिक भाविक सत्त्वस्थ । किती येती गणवेना ॥ ७४ ॥
पुराणिक आणि हरिदास । गायक करिती स्तुतीस ।
नवसीकही बहुवस । नवस फेडिती नानापरी ॥ ७५ ॥
कोणी लोटांगणे घालिती । कोणी शर्करा वांटिती ।
वार्याो तरी किती करिती । गुरुवार आणि पौर्णिमा ॥ ७६ ॥
कोणी प्रदक्षिणा घालिती । कोणी गुरुद्वारीं झाडिती ।
सेवा ऐसी नानारिती । किती प्रकार सांगावा ॥ ७७ ॥
कामना पुरती अनेक । देहव्याधी कितीयेक ।
मुक्त करिती गुरुनायक । सेवा करितां भक्तीनें ॥ ७८ ॥
असो प्रपंच आणि परमार्थ । समाधी पुरविते आर्त ।
साक्षात्‌ सद्‌गुरु समर्थ । तेथें वास करिताती ॥ ७९ ॥
ऐसें तीर्थ श्रीक्षेत्र । विख्यात होईल सर्वत्र ।
बहुत साधितील अर्थ । प्रपंचीं आणि परमार्थीं ॥ ८० ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय बारावा
समास तिसरा

॥ श्रासद्‌गुरु श्रीब्रह्मचैतन्यमहाराजाय नमः ॥
समाधी क्षेत्र स्थापिलें । पाकगृह भव्य केलें ।
धान्याचें कोठार भरलें । अन्नछत्र गुरुगृहीं ॥ १ ॥
सज्जनगडीं उच्छाहपद्धति । तैसीच येथेंहे ठेविती ।
दुर्लभ सेवा अंगीकारिती । सच्छिष्य बहुतांपरी ॥ २ ॥
श्रींची मूर्ती उचलणे । हें जालना मठानें करणें ।
भालदार चोपदार ललकारणें । आटपाडी आणि पंढरी ॥ ३ ॥
येथील मंदिरवासी यांनी । सेवा घेतली नेमोनी ।
अबदागिर्यार श्रींचे स्थानीं । धरिती तेही परिसावे ॥ ४ ॥
मोरगिरी आणि सोलापूर । येथील मठपती साचार ।
सूर्यपानें सद्‌गुरुवर । धरिती बहुप्रीतीनें ।
विटेंकर भांडारे । गोंदवलेंवासी दुसरे ।
नित्य वारिती चामरें । महोत्साहीं गुरुगृहीं ॥ ६ ॥
बेलधडी आणि गिरवीकर । मंदिरवासी भक्त थोर ।
मोर्चलें वारिती साचार । विंझणेकरी परिसावे ॥ ७ ॥
म्हासुर्णें आणि कुरवलीकर । मंदिरवासी भक्त थोर ।
विंझणें वारिती प्रेमें फार । श्रीचरणीं प्रीतीनें ॥ ८ ॥
नामधारक भक्त प्रजा । छत्रपति गुरुमहाराजा ।
यांचे सोहाळ्यांतील समाजा । कर्हातड मठपति छत्र धरी ॥ ९ ॥
रुमालवाले दोघेजण । बाळकूबुवा कलेढोण ।
गोविंदबुवा कुरवलीकर जाण । प्रेमळ भक्त श्रींचे ॥ १० ॥
धनुष्यबाण चौघे धरिती । कागवाड पाटण खेर्डी वदती ।
तैसीच सांगली मंदिराप्रती । सेवा दिधली नेमोनी ॥ ११ ॥
दिवट्या पाजळिल्या कोणी । तेंही परिसावें सज्जनीं ।
हरदा आणि शेंदुरजणी । मांडवें आणि दहिवडी ॥ १२ ॥
नित्य पूजाअर्चन भीमराव । मोडक कुशल पूर्ण ।
चित्रविचित्र शृंगारून । मन वेधिती सकळांचें ॥ १३ ॥
म्हासुर्णेकर शास्त्रीबुवा गुणी । पुराण वाचिती श्रीसदनीं ।
कीर्तनसेवेलागोनी । बहुत येती गुणीजन ॥ १४ ॥
परि सांगलीकर हरिदास । लळित नेमलें सेवेस ।
सांगलीकर फडणवीस । आरती धरिती भक्तीनें ॥ १५ ॥
शालिग्राम गुरुजी विद्वान्‌ । सेवा करिती तबक व्यंजन ।
देशपांडे आटपाडीकर जाण । घोडा धरिती श्रींपुढे ॥ १६ ॥
माळी भक्त दहिवडीचे । वाहन झाले श्रींचे ।
पालखे धरोन साचे । गुरुसेवा साधिती ॥ १७ ॥
शिवणीकर नापित येवोन । दर्पण दावित श्रींलागोन ।
गरुडटके धरिती जाण । हुबळीचे मठपती ॥ १८ ॥
रांगोळ्या घालिती केतकर । चित्रविचित्र मनोहर ।
गंध उपाध्याय चतुर । सकळांसी लाविती ॥ १९ ॥
बारसवडे गोंदवींचे । काज करिती उच्छिष्टाचें ।
गोमयगोळा घेवोन वेंचे । उच्छिष्टें तेही परिसावी ॥ २० ॥
दत्तोपंत इंदोरकर । लेखक भाविक सात्त्विक थोर ।
गोरक्षणीं साह्यकार । श्रीचरणीं देह लाविती ॥ २१ ॥
दाढे उपनामक अंताजीपंत । कीर्तनसमयीं बुका लावित ।
आरती श्रींसी ओंवाळित । खिरापत वांटिती ॥ २२ ॥
अत्तरगुलाव तांबूलोपचार । पुष्पमालादि सोपस्कार ।
श्रींचे दरबारीं पुणेंकर । सेवा घेती नेमोनी ॥ २३ ॥
ऐसे हे गुरुभक्तजन । मिळवतील दुर्लभ स्थान ।
तयांसी सद्भाकवें नमन । करूं सेवा एवढीच ॥ २४ ॥
पुढेंही येतील आणीक । सेवितील गुरुसेवासुख ।
परमार्थी प्रापंचिक । त्यांची गणती कोण करी ॥ २५ ॥
असो समर्थांची गोशाळा । वांटिली होता पाळावयाला ।
परि अवर्षणें दिधला झोला । आणूनि सोडिती गुरुचरणीं ॥ २६ ॥
पुनरपि गोरक्षणसंस्था । स्थापन झाली जी तत्त्वतां ।
आलीं अनाथांचे नाथा- । पाशीं मूक जनावरें ॥ २७ ॥
अश्वपालक विश्वनाथ । नारायण कर्नाटकी भक्त ।
इंदूरकर दत्तोपंत । गोरक्षणीं बहु झटती ॥ २८ ॥बसाप्पा तेलंगणदेशी । नामस्मरणें अघ नाशी ।
देह झिजवी सामाधीपाशीं । मौनव्रत धरोनी ॥ २९ ॥
ऐसे अनेक सेवा करिती । कांहीं केली उपपत्ती ।
आतां परिसावी श्रोतीं । समाधिलीला ॥ ३० ॥
समाधिस्थान विवरीं झालें । वरती मंदिर बांधिलें ।
गोठणीं गोपाल शोभलें । कैसे तेंही अवधारा ॥ ३१ ॥
समर्थ जातां गोशाळेसी । विनोदें वदती सर्वांसी ।
येथें गोपालमंदिरासी । करितां बहु शोभेल ॥ ३२ ॥
ऐसें वदले बहुत वेळां । तें आठवले जी सकळां ।
गोशाळे घनसांवळा । श्रीं सन्निध असावा ॥ ३३ ॥
ब्रह्मानंद सिद्ध यांनी । तेंचि कथिले येवोनि ।
तेव्हां समाधिशिरस्थानी । गोपालमंदिर बांधलें ॥ ३४ ॥
कामें वाढलीं बहुवस । तेणें गोपालस्थापना लांबली विशेष ।
शके अठराशें बेचाळीस । वैशाखीं मुहूर्त शोधिला ॥ ३५ ॥
श्रीमत्‌ भागवत यांनी । मूर्ति दिधली आणवोनी ।
पाहतां प्रेम ये भरोनी । गोंडस तेजस हास्यमुख ॥ ३६ ॥
तें मुरलीधराचें ध्यान । पाहतां वेधितसे मन ।
यास्तव सुवासिनी येवोन । दृष्ट काढिती वेळोवेळां ॥ ३७ ॥
सात दिवस नामगजर । केला उत्साह बहु थोर ।
भक्त येती अपार । गोपालमूर्ति पहावया ॥ ३८ ॥
वैशाख शुद्ध त्रयोदशी । मूर्ति स्थापिली विधींसी ।
साठये उपनाम जयांसी । गुरुभक्त यांचेकरवीं ॥ ३९ ॥
सप्त ठायींची जीवनें । घालिती कृष्णा मंगलस्नानें ।
वेदघोषे नामस्मरणें । मुरलीधरा बैसविलें ॥ ४० ॥
हुबळीकर मल्लाप्पा यांनी । खर्च केला ते समयीं ।
नित्य पूजा उच्छाहीं । नेमणूक करून दिधली ॥ ४१ ॥
असो ऐसे देव भक्त । एकेस्थळीं शोभा पावत ।
अनन्याचे अनंत हेत । पुरवावया राहिले ॥ ४२ ॥
सद्‌गुरुवास निरंतर । ऐसा रोकडा साक्षात्कार ।
भाविकांस पैलपार । भावबळें पावविती ॥ ४३ ॥
नाना नवसांतें पावती । संकटीं दृष्टांती बोधिती ।
सेवा करितां पुरविती । कामना बहुपरींच्या ॥ ४४ ॥
अंतरसाक्ष अंतरीं कळे । बाह्य दृश्य तें आढळे ।
वर्णितां होईल आगळें । ग्रंथसंख्याप्रमाण ॥ ४५ ॥
परि एखादा दृष्टांत । देऊन पुरवूं मनोरथ ।
समाधीमाहात्म्य अत्यद्‌भुत । कोण वर्णूं शकेल ॥ ४६ ॥
अप्पासाहेब कागवाडकर । स्मृतिहीन झाले फार ।
ब्रह्मसमंधें जर्जर । केले पूर्वींसारिखे ॥ ४७ ॥
पुत्रकलत्रा पीडीतसे । गृहकर्त्यासी लाविलें पिसें ।
तमोबुद्धि गृहीं वसे । उपाय सुचों देईना ॥ ४८ ॥
ऐसे गेले कांहीं दिवस । चिंता उपजली सर्वांस ।
मग समाधीसमीप सेवेस । धाडिले मायबंधूंनीं ॥ ४९ ॥
सेवा करितां बहुवस । श्रीमंत आले स्मृतीस ।
वारंवार नमिती पदास । ब्रह्मचैतन्यगुरूंच्या ॥ ५० ॥
पुर्वी जैसे साह्य होती । त्याहून अधिक शीघ्रगति ।
समाधीसेवेसी पावती । आश्चर्य नारीनरांसी ॥ ५१ ॥
देहव्याधिमुक्त करिती । निपुत्रिकां पुत्र होती ।
मुमुक्षुजनां संरक्षिती । पाठी पोटी राहोनी ॥ ५२ ॥
शंकरशास्त्री म्हासुर्णेकर । यांचे स्नुषेसी निशाचर ।
पीडीतसे वारंवार । घालिती समर्थचरणांवरी ॥ ५३ ॥
सेवा करितां अतिगहन । पीडा निवारिली दारुण ।
ऐसें समाधि महिमान । श्रोतेजनीं परिसावें ॥ ५४ ॥
श्रीचरणीं जे अनन्य । तयांसी प्रत्यक्ष दर्शन ।
देवोनि करिती समाधान । ब्रह्मचैतन्य सद्‌गुरु ॥ ५५ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय बारावा
समास चवथा

श्रीसमाधिस्थ झाल्यावरी । मागें वर्तलें कैशापरी ।
तें आतां श्रोतीं चतुरीं । स्थिरचित्तें परिसावें ॥ १ ॥
आनंदसागर अनन्य भक्त । जालनामंदिरीं होते वसत ।
उपासना वाढविली बहुत । कीर्ति पसरली चहूं देशीं ॥ २ ॥
अंबड येथें मंदिर । बांधोनि स्थापिले रघुवीर ।
अन्नदान नामगजर । सिद्धपणें वाढविले ॥ ३ ॥
समर्थ असतां सगुणदेहीं । आनंदसागर झाले विदेही ।
परिसतां आनंद होई । सिद्धकरणी अघटित ॥ ४ ॥
माघ शुद्ध पौर्णिमेसी । निघाली स्वारी भिक्षेसी ।
दासनवमीउत्सवासी । सामग्री पाहिजे ॥ ५ ॥
मातेसी केला नमस्कार । जे बहुतां दिवशीं होता स्थिर ।
पाहोनि आश्चर्य नारीनर । मनीं मानूं लागले ॥ ६ ॥
विदेशप्रयाण निमित्त । करोनि आज्ञा घेतली त्वरित ।
माउली खोंचली मनांत । पुढील भविष्यार्थ जाणोनि ॥ ७ ॥
आज्ञा घेवोनि निघाले । एके ग्रामीं वसतीस आले ।
तेचि दिनीं ग्रस्त केलें । राहूनें चंद्रासी ॥ ८ ॥
भजन निर्याणअ्भंग । करुणारसें होती दंग ।
चतुर श्रोतयां तगमग । होवों लागली अतिशय ॥ ९ ॥
वासुदेव नामें सुतारासी । पाचारिलें एकांतासी ।
वदले आम्ही जाऊं वैकुंठासी । तुज इच्छा असेल तें माग ॥ १० ॥
तों तो करूं लागला शोक । हास्य करी गुरुनायक ।
’अरे हें शोकाचें कौतुक । पुढें आहे ॥ ११ ॥
सगुणीं सगुण लोपलें । निर्गुण जैसें तैसें भरले ।
यांत विपरीत काय झालें । वायां शोक न करावा’ ॥ १२ ॥
ऐसें करितां सांत्वन । हस्त जोडोनि बोले दीन ।
’इच्छा होईल तें दर्शन । येचि स्वरूपीं मज द्यावें’ ॥ १३ ॥
’बरें’ म्हणोनि तयासी । आले पुनरपि भजनासी ।
प्रेमें अश्रु नयनांसी । आणिले समस्त जनांच्या ॥ १४ ॥
वारंवार पुसों लागले । ’ग्रहण सुटलें वा न सुटलें’ ।
’सुटलें’ म्हणतांच संपविलें । निरूपण ते समयीं ॥ १५ ॥
नामगजर सुरू केला । देह श्रीचरणीं ठेविला ।
आत्मा रामरूपीं मिळाला । ठायींचे ठायीं ॥ १६ ॥
शोक करिती नारीनर । मग केला अग्निसंस्कार ।
समाधि बांधावी हा विचार । शिष्यांअंतरीं प्रगटला ॥ १७ ॥
तंव आज्ञा झाली दृष्टांतासी । ’करितां रामसेवेसी ।
आम्हा पावेल निश्चयेंसी । समाधी वेगळी करूं नये’ ॥ १८ ॥
आनंदसागर वैराग्यशील । समाधि उपाधि केवळ ।
त्यजोनि राहिले निश्चळ । रामरूप होवोनी ॥ १९ ॥
असो जननी भार्या दोन सुत । दोन कन्या तयांप्रत ।
पांडुरंगबुवा जामात । समर्थें शोधोनि काढिला ॥ २० ॥
रामजीबुवा शिष्य भले । पांडुरंग दुजे वहिले ।
दोहीं संस्थान चालविलें । श्रींचे आज्ञेवरोनी ॥ २१ ॥
वडील सुत नामस्मरणीं । देह ठेविता झाला धरणीं ।
धाकटा पुरुषोत्तम म्हणोनी । अज्ञान बालक मठपती ॥ २२ ॥
श्रींचे दुजे शिष्य ब्रह्मानंद । ज्यांनी जाणिले गुरुपद ।
तयांची कथा प्रसिद्ध । अल्पशीं कथन करूं ॥ २३ ॥
श्रींची समाधि स्थापिली । उत्सव पूजा आंखोन दिली ।
उपासना अत्यंत वाढविली । कर्नाटकप्रांतीं ॥ २४ ॥
परि स्वयें राहिले अलिप्त । कृष्णातीरीं समाधिस्थ ।
जाहले तो प्रकार संत- । सज्जनीं थोडा परिसावा ॥ २५ ॥
शके अठराशेंचाळीस । भाद्रपद कृष्णमास ।
फिरत आले कागवाडास । रामभेटीनिमित्त ॥ २६ ॥
विश्रांती घेऊं चार दिवस । म्हणोनि सांगती सर्वांस ।
मुंडलाप्पा नामें शिष्यास । कर्नाटकीं धाडिलें ॥ २७ ॥
एकही शिष्य ते वेळीं । नसे ठेविला जवळीं ।
गुरुभक्तांचे मेळीं । काळ क्रमित राहिले ॥ २८ ॥
सांगलीहूनि हरिदास । आले तेथें दर्शनास ।
बरें म्हणोन तयांस । ठेवोन घेती आनंदें ॥ २९ ॥
आम्हां पोंचवावें आणि जावें । ऐसें वदती स्वभावें ।
परि सूक्ष्म अर्थाचे गोंवे । उमजतीना कवणासी ॥ ३० ॥
वद्य चतुर्दशी गुरुवार । प्रातःकाळी उठोनि सत्वर ।
रामदासी कागवाडकर । आणि हरिभाऊंस पाचारिलें ॥ ३१ ॥
सहज विनोदें बोलती । ’क्वचित्‌ झाल्या देहगेति ।
अग्नि न द्या तयाप्रति । कृष्णागर्भीं सोडावा ॥ ३२ ॥
स्नाम करोनि मोकळें । व्हावें दुःखावेगळें’ ।
संतमाहात्म्य न कळे । कोणाएकासी ॥ ३३ ॥
आप्पासहेब कागवाडकर । गुरुभक्त इनामदार ।
नवबाग नामें सुपीक थोर । कृष्णातीरीं मळा असे ॥ ३४ ॥
तेथें गेले स्नानासी । वाळेश्वर क्षेत्रासी ।
स्नान करोनि वस्तीसी । राहिले तेथें गुरुवारीं ॥ ३५ ॥
गुरुसेवा उपोषण । करिती शेवटचा म्हणोन ।
हरिभाऊ संगती जाण । एकले एक ॥ ३६ ॥
अनंत शिष्य अनंत शरण । सकलां दूर करोन ।
राहिले करीत नामस्मरण । नवबागीं कदंबछाये ॥ ३७ ॥
सायंकाळी केले भजन । आळविले दयाघन ।
गुरुपादुका वंदोन । स्तवन करिती बहुपरी ॥ ३८ ॥
त्यांतचि निरूपण केलें । हरिदास श्रोते भले ।
देहबंधनानें भुलले । मानोनि जीवदशा ॥ ३९ ॥
ही देहरूप उपाधि । मानीव चाळविते बुद्धि ।
सत्याची दवडोन शुद्धि । जीवात्म्यासी गुंतवी ॥ ४० ॥
चार देह चार अवस्था । ज्ञानी राहे यांपरता ।
तयासी लिंगदेह सोडितां । गुंतीं नाहीं तिळभरी ॥ ४१ ॥ऐसें करोनि निरूपण । पुनरपि करोनि भजन ।
धूप दीप आरती करोन । सांग केली गुरुसेवा ॥ ४२ ॥
एक प्रहर राहतां निशी । नाम श्वासधारेसरसीं ।
स्थिर करोनि वृत्तीसी । एकलयें चालविली ॥ ४३ ॥
तेज फांकले चहूंकडे । दृष्टीसी दृष्टी न भिडे ।
स्थूलापासोन मुरडे । चैतन्न्य श्रीरामरूपीं ॥ ४४ ॥
प्रातःकाळसमयासी । रामचरणतीर्थासी ।
घेवोनि आले रामदासी । ब्रह्मानंदां द्यावया ॥ ४५ ॥
आनंदें मुख पसरोनि । तीर्थ घेतलें तयांनी ।
श्रीरामप्रभूचे चरणीं । वंदन केलें हस्तद्वयें ॥ ४६ ॥
इकडे चालिला नामगजर । ब्रह्मानंद झाले स्थिर ।
पाहतां पाहतां व्यापार । दृश्य तें स्थिर झालें ॥ ४८ ॥
मग नामगजरें कलेवर । नेलें सन्निध बाळेश्वर ।
पूजा आरत्या करोनि सत्वर । जलसमाधि दीधली ॥ ४९ ॥
सकळांसी जाहलें दुःख । अनिवार करिती शोक ।
दुजे आमचे गुरुनायक । तिहीं त्यजिलें आम्हांसी ॥ ५० ॥
असो नवबागीं बांधिती समाधी । दर्शना येते भक्तमांदी ।
श्रीमंतें पूजा‍अर्चनविधी । व्हावया भूमि दिधली असे ॥ ५१ ॥
तिकडे व्यंकटापूर देवस्थानीं । समाधी पूर्वींच बांधोनी ।
तेथेंच पादुका स्थापोनी । भक्त करिती उत्सव ॥ ५२ ॥
श्रीपादभट्ट व जोगळेकर जाण । साधक शिष्य अनन्य ।
तयांसी कथिलें संस्थान । चालवावें श्रीसेवे ॥ ५३ ॥
बेलधडी आणि बिदरहळ्ळी । येथील देवस्थानें भलीं ।
पूर्वींच व्यवस्था केली । जेथील तेथें ॥ ५४ ॥
गोंदावलीं कळली मात । सकलही झाले दुःखित ।
आईसाहेब वदती तेथ । तेंही श्रोतीं परिसावें ॥ ५५ ॥
समर्थ गेलियानंतर । ब्रह्मानंदे केलें स्थिर ।
वदती असतां मी तुमचा कुमर । शोक कासया करावा ॥ ५६ ॥
वारंवार उपदेशुनी । बोधें चित्त शांतवुनी ।
गुरुभक्तां गुरुजननी । वाटे दुजी अवतरली ॥ ५७ ॥
तोही झाला समाधिस्थ । आतां काय करणें जिवित ।
म्हणोनि अन्न वर्जित । गुरुभार्या गोंदावलीं ॥ ५८ ॥
पयःपान क्वचित्‌ करिती । मनीं पतिचरण ध्याती ।
एक मासा‍उपरांतीं । देह धरणीं ठेविला ॥ ५९ ॥
आश्विन कृष्ण दर्शतिथी । आईसाहेब आम्हां सोडिती ।
दहन करून समाधी करिती । श्रींचे वामभागप्रति ॥ ६० ॥
प्रतिवर्षीं उत्सवास । करिताति अमावस्येस ।
स्नान पूजा नैवेद्यास । नित्य चाले उपासना ॥ ६१ ॥
बत्ताशा श्रींचे वाहन । परम भक्त जो अनन्य ।
तेणेंही त्यजिला प्राण । श्रींचे चरणांसमोर ॥ ६२ ॥
तयाची बांधिली समाधी । श्रींचे पुढें भक्तमांदी ।
दर्शन घडे श्रींचे आधीं । गुरुसेवा परम भाग्य ॥ ६३ ॥
असो ऐसा इतिहास । समाधीचा कथिला निःशेष ।
श्रवण करितां वैराग्यास । वरील मन निश्चयें ॥ ६४ ॥
उपजेल तितुकें मरेल । घडेल तितुकें बिघडेल ।
परि सत्कीर्ति श्रवणीं पडेल । अनंतकाल पर्यंत ॥ ६५ ॥
सत्कर्म अथवा दुष्कर्म । उभयतांचा एकचि धर्म ।
भोग भोगवील परम । सुखदुःख निश्चयें ॥ ६६ ॥
यास्तव संतचरित्र । विवरोन व्हावें स्वतंत्र ।
कर्मबंधनाचें सूत्र । बंधनापासोन सुटावें ॥ ६७ ॥
नरदेह रत्नेपेटी । भोगें न करावी करंटी ।
सद्धर्मीं लावोन शेवटीं । अलिप्त असावें ॥ ६८ ॥
असो महाभागवत कुर्तकोटी । जगद्‌गुरु झाले करवीरमठीं ।
एकी करोन शेवटीं । स्वयें राहिले अलिप्त ॥ ६९ ॥
भय्यासाहेब इंदूरकर । श्रीचरणीं ठेवाया शरीर ।
आले सांडोन इंदूर । गुरुभक्त बहु ज्ञानी ॥ ७० ॥
सकलां सांगती मात । गुरुक्षेत्रीं महिमा अनंत ।
तेथें ठेवितां देहाप्रत । पुनरपि जन्म त्या नाहीं ॥ ७१ ॥
कोणी माझे अस्थींसी । न न्याव्या प्रयागासी ।
अर्पितों श्रीचरणासी । परम पावन क्षेत्र हे ॥ ७२ ॥
ऐसें बोलतां चालतां । देह ठेविला तत्त्वतां ।
गुरुभक्तीनें गुंता । सोडविला बहुजन्मींचा ॥ ७३ ॥
असो ऐसी भक्तमंडळी । समाधी समाधान पावली ।
उपासना कैसी चालली । तीही श्रोतीं परिसावी ॥ ७४ ॥
सद्‌गुरु समर्थांचे शिष्य । तैसेचि जे शिष्यानुशिष्य ।
बहु मंडळी लक्षानुलक्ष । दुरित नाशिती कलियुगीं ॥ ७५ ॥
जागोजागी नामसप्ताह । पुण्यतिथि-आदि महोत्साह ।
अखंड चालिला प्रवाह । हृदयीं ध्याती कितीएक ॥ ७६ ॥
श्रवणीं संगतीं किती तरती । त्यांची नाहीं नाहीं मिती ।
घरोघरीं पादुका स्थापिती । पूजाअर्चा करावया ॥ ७७ ॥
वर्हाीडी ग्राम सेंदुरजन । तेथें मठ ब्रह्मचैतन्य ।
दक्षिणे करवीरक्षेत्री जाण । ब्रह्मचैतन्यमंदिर स्थापिलें ॥ ७८ ॥
ऐसी उपासना चालली । दिगंत कीर्ति पैसावली ।
तेंही लिहितां लेखणी भागली । गुरुलीला अगम्य ॥ ७९ ॥
आतां ही सद्‌गुरुलीला । त्रयोदशीं जाय विश्रांतीला ।
हृदयीं ध्याऊं पदाला । म्हणजे प्रसाद होईल ॥ ८० ॥
गुरुलीलाबोधरसा । जरी उमटे हृदयीं ठसा ।
तरी चुकेल हा वळसा । जन्ममृत्युचा ॥ ७१ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ८२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते द्वादशाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति द्वादशोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय तेरावा
समास पहिला

मुखें बोलवी सद्‌गुरुबुद्धिदाता । अहंभार हा वाब्गवी कोण माथां ॥
जडो भावना रामदासीं सदा ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १३ ॥

जयजयाजी मंगलमूर्ति । जयजय माय सरस्वती ।
आत्माराम सर्वांभूतीं । नमन करूं साष्टांगे ॥ १ ॥
नमो सद्‌गुरु परेशा । विराटरूपा विश्वेशा ।
मायबापा प्रकृतिपुरुषा । संतसज्जनां नमन असो ॥ २ ॥
धन्य सद्‌गुरुप्रसाद । केला न वचे अनुवाद ।
त्रिलोकीं दुर्मिळ मकरंद । गुरुपूत भृंग सेविती ॥ ३ ॥
पाहोन जी प्रसादगोडी । हरिहरादिक झालीं वेडी ।
घेतां जन्म बहुत कोडी । गुरुप्रसाद दुर्लभ ॥ ४ ॥
एक्या गुरुप्रसादाकारणें । योगयाग पुरश्चरणें ।
देहादि ममत्व सोडणें । दृढविश्वास गुरुवचनीं ॥ ५ ॥
प्रसाद जयावरी झाला । तो कृतकृत्य होवोनि गेला ।
जीवशिव भेद मावळला । ठायींचे ठायीं ॥ ६ ॥
गुरुप्रसाद परमामृत । सदा वांच्छी अमरनाथ ।
दुर्लभ दुर्मिळ अनंत । सुकृतेंही जोडेना ॥ ७ ॥
पुण्यपाप क्षय झाला । जीवात्म्याचा गोवा तुटला ।
तरीच सद्‌गुरुपदाला । पडेल मिठी ॥ ८ ॥
जडले ते तन्मय झाले । स्वस्वरूपानंदीं रमले ।
त्यांचे स्मरणें अनेक तरले । धन्यधन्य गुरुकृपा ॥ ९ ॥
गुरुकृपा होय जयासी । काव्य व्युत्पत्ति नको त्यासी ।
ज्ञान होय सर्वांशी । समाधान पूर्णत्वें ॥ १० ॥
निःसंदेह जें विज्ञान । तेंचि गुरूचें कृपादान ।
वेदशास्त्रां जेथें मौन । तेंचि स्वयें गुरुभक्त ॥ ११ ॥
अंध पंगु बहिरा मुका । परि सद्‌गुरूसी सलोखा ।
तया न गणावा फिका । साधुशिरोमणि ॥ १२ ॥
नरदेह सार्थक करावें । ऐसें घेतलें ज्याचे जीवें ।
तेणें हेंचि एक साधावें । अढळ लक्ष गुरुवचनीं ॥ १३ ॥
चित्तशुद्धि मनोजय । फलत्याग वासनाक्षय ।
शून्यावस्थेवरी विजय । गुरुपूतें मिळविला ॥ १४ ॥
श्रवण मनन अभ्यास समाधि । कुंडलिनी जे अमृत शोधी ।
ब्रह्मांड भेदून निरुपाधि । करी क्षणीं गुरुकृपा ॥ १५ ॥
स्थूल सूक्ष्म कारण । महाकारण विराट्‌ गहन ।
हिरण्यगर्भ अव्याकृति जाण । मूल प्रकृति कोश हे ॥ १६ ॥
ऐसें हें भ्रमबंधन । तत्काल जाय तुटोन ।
स्वस्वरूपानुसंधान । अखंड ऐक्य संचलें ॥ १७ ॥
रंकाचा होतो राव । जीवाचा होतो शिव ।
क्षणामाजीं हें अभिनव । सद्‌गुरुस्वरूप देखिलिया ॥ १८ ॥
सद्‌गुरुवीण जिणें पाहीं । सर्वथा श्लाघ्य होणें नाहीं ।
देव भक्ता ऐक्य कांहीं । प्रसादेविण होईना ॥ १९ ॥
सद्‌गुरुपदीं अनन्य । सर्वभावें जावें शरण ।
व्हावें दीनाहून दीन । तैं होय गुरुकृपा ॥ २० ॥
सद्‌गुरुपद शाश्वत । तेथें ठेवितां अखंड चित्त ।
देहादि ममता समस्त । गुरुचरणीं अर्पाव्या ॥ २१ ॥
सद्‌गुरुकृपेलागून । ब्रह्मांड मानावें हीन ।
जाणीव नेणीव विसरून । गुरुवचनीं विश्वास धरावा ॥ २२ ॥
तरीच होय गुरुकृपा । तरीच चुकती या खेपा ।
तरीच प्रकाश ज्ञानदीपा । अलक्षीं लक्ष विरेल ॥ २३ ॥
ऐसा सद्‌गुरुप्रसाद । आनंदाचा निजकंद ।
परा-उन्मनीहून शुद्ध । विद्ध करी वासना ॥ २४ ॥
नरदेहीं दक्षता गहन । तयामाजीं सन्मार्ग गहन ।
सन्मार्गीं अध्यात्म गहन । त्याहीवरि गुरुकृपा ॥ २५ ॥
भाविकां सदा सुफलित । इहपर पुरवी मनोरथ ।
गुरुकृपेवीण स्वार्थ । आन नेणे ॥ २६ ॥
सिद्ध साधक महानुभाव । जाणती हाच अभिप्राव ।
ना तरी कलीचा स्वभाव । वाग्जल्प विकल्प धरावा ॥ २७ ॥
सज्जनांसी युगधर्म । न पीडी संगतकर्म ।
युगनियंता श्रीराम । सर्वकाळ रक्षितसे ॥ २८ ॥
येणें परी कलियुगांत । अनेक होऊन गेले संत ।
जगदुद्धार हाचि हेत । धरोनियां अवतरले ॥ २९ ॥
तैसे ब्रह्मचैतन्य सद्‌गुरु । आम्हा अनाथांचें तारूं ।
तयांचा प्रसादविस्तारु । लीलाग्रंथी वर्णिला ॥ ३० ॥
निमित्तमात्र लेखक । स्फूर्तिरूप गुरुनायक ।
ऐसा हा प्रसाद देख । अत्यानंदें सेवावा ॥ ३१ ॥
स्थूलावरी राजसत्ता । स्थूलसूक्ष्मीं गुरुसत्ता ।
अखंड सूत्रें चालविता । एकला एक अलिप्त ॥ ३२ ॥
तयांचा दासासी प्रसाद । सद्‌गुरुलीला ही विशद ।
श्रवणमननें शुद्ध बोध । घेऊन सन्मार्गें चालावें ॥ ३३ ॥
संतचरित्र परम गोड । श्रवणें तृप्त वासनेची ओढ ।
करोनि देईल श्रद्धा जाड । साधकांसी सुनिश्चयें ॥ ३४ ॥
नास्तिकांचें बंड मोठें । साधका ने आडवाटे ।
नरदेहा येवोन करंटे । केले कितीएक ॥ ३५ ॥
तेणें पहावी सद्‌गुरुलीला । द्वादशाध्यायमंत्रमाळा ।
कीं हा द्वादशादित्यमेळा । अज्ञानतिमिर घालवी ॥ ३६ ॥
त्रयोदशीं ज्ञानरवि । शीघ्रचि होईल गोसावी ।
श्रवण मनन क्रिया बरवी । शुद्धांतकरणें केलिया ॥ ३७ ॥
कवण अध्यायापासूनि । कवण बोध घ्यावा मनीं ।
वंदन करोनि श्रीचरणीं । विशद करूं गुरुकृपें ॥ ३८ ॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण । गणेश-शारदा-स्तवन ।
मग सद्‌गुरुवंदन । साष्टांगभावें ॥ ३९ ॥
गण नामें इंद्रियें समस्त । तयांचा स्वामी गणनाथ ।
इंद्रियनिग्रह मूळ हेत । परमार्थी साधी निर्विघ्न ॥ ४० ॥
शारदा सुविद्या सद्बुतद्धि । असलिया परमार्थ साधी ।
अविद्या वैभवोपाधि । लावून फशी पाडील ॥ ४१ ॥इंद्रियनिग्रह करोनि । सद्विद्यें शुद्धि साधोनि ।
शरण रिघतां गुरुचरणीं । समाधान पूर्णत्वें ॥ ४२ ॥
आधीं विद्या नाहीं पढला । आणि राजयापाशीं गेला ।
देईं म्हणे फडणविशीला । तरी तें निरर्थक ॥ ४३ ॥
आधीं विद्या शिकावी । तरी राजा स्वयें बोलावी ।
तैसें शम दम सुविद्या बरवी । असतां सद्‌गुरु भेटती ॥ ४४ ॥
क्षेत्र सोज्ज्वळ तयार झालें । मेघजळ मातीस आलें ।
तरी धांवून येती कृषीवलें । ज्ञानबीज रुजवाया ॥ ४५ ॥
नाशिवंत सांडोन समस्त । शाश्वत ध्यावे सद्‌गुरुनाथ ।
येथींचा जो गर्भितार्थ । विवरविवरों उकलावा ॥ ४६ ॥
गुरुगम्य मायानिरास । गुरुगम्य ज्ञानकळस ।
गुरुगम्य पूर्ण भक्तिरस । समाधान गुरुकृपा ॥ ४७ ॥
येथें आशंकेची उरी । पतिता कोण उद्धरी ।
गुरुभक्ति कैशापरी । करावी तेणें ॥ ४८ ॥
सद्‌गुरुपद शाश्वत । तेथें जावया कोण समर्थ ।
अंतर्बाह्य विषयें लिप्त । बहुतां जन्मापांसोनि । ४९ ॥
तयासि होतां संतभेटी । बुद्धि वळेल उफराटी ।
शमदमादि हातोटी । सुबुद्धि होय मानावा ॥ ५० ॥
याकारणें गुरुमूर्ति । सगुणरूपें अवतरती ।
दुष्प्राप्य वस्तु आयती । अभाग्याचे घरी रिघे ॥ ५१ ॥
धरितां तयाची कास । हळूंहळूं साधनास ।
लावोन मनोवृत्तीस । करिती शुद्ध ॥ ५२ ॥
मन बुद्धि विषयें लिप्त । तैंशाच कामना उठत ।
त्यांहून अन्य वाटे व्यर्थ । गोडी नुपजे निष्कामीं ॥ ५३ ॥
स्त्रिया पुत्र आणि धन । जगीं मान्यता सन्मान ।
देह गेह संरक्षण । इच्छिती हेंचि आवडी ॥ ५४ ॥
तयांच्या पुरुवोनि कामना । हळूंहळूं निष्काम भजना ।
लावोन करिती समाधाना । सद्‌गुरु संत समर्थ ॥ ५५ ॥
जैसीं लेकुरें हट्ट घेती । बाहुलीस जेवूं घालिती ।
माय करोन तैशा रिती । अर्भकामुखीं ग्रास घाली ॥ ५६ ॥
ऐसें मानत मानत साधनासी । लावोन चित्तशुद्धीसी ।
झालिया सद्‌गुरुकृपेसी । पात्र होय ॥ ५७ ॥
नूतन वधू गृहीं जातां । ठेवा न ये तिचे हातां ।
सुनीतीनें सेवा करितां । धनीण तेचि असे ॥ ५८ ॥
तैसे सद्‌गुरु आणि अज्ञान । भेटलिया होय समाधान ।
जरी साधनीं देह झिजवोन । गुरुवचनीं विश्वास धरील ॥
ऐसें सद्‌गुरुवंदन । तैसेचि संत सज्जन ।
परमार्थमार्गींची शिकवण । प्रत्यक्ष क्रियेनें दाविती ॥ ६० ॥
जैसा चाणाक्ष शेजारी । दक्षतेनें व्यवहार करी ।
संगतीं शिकती नानापरी । पाहोनिया आपेंआप ॥ ६१ ॥
ऐसे संत सज्जन । तयांचे धरितां चरण ।
वासना मागें वळोन । रामापायीं जडतसे ॥ ६२ ॥
इतुका साधावया स्वार्थ । देह पाहिजे परम पुनीत ।
मायबापें कारणीभूत । शुद्ध बीज रक्षाया ॥ ६३ ॥
मातेपरी ममता नाहीं । परि जारिणी घात करिते पाहीं ।
विपरीत बुद्धि सकलही । विपरीत क्रिया केलिया ॥ ६४ ॥
कुलवेली राहील शुद्ध । तरी बुद्धि करील भेद ।
मायोद्भ व संसारखेद । बहुत जन्मोजन्मींचा ॥ ६५ ॥
कुलाचार सांडूं नये । उपकारिया विसरूं नये ।
लीनता धरोनि उपायें । अधर्ममात्र त्यागावे ॥ ६६ ॥
आतां वंदूं श्रोतेजन । जे संतकथा भोक्ते गहन ।
श्रवणीं सुबुद्धि धरोन । शुद्धमानसें बैसले ॥ ६७ ॥
कोणा मिसें काये होणें । बुद्धि वक्तयासी देणें ।
पहा धृतराष्ट्राकारणें । ज्ञानचक्षूं संजया ॥ ६८ ॥
श्रोता मिळालिया सावध । वक्त्या सुचे बुद्धिवाद ।
श्रोता सुप्त आणि सुंद । असतां उल्हास होईना ॥ ६९ ॥
श्रोता असावा अर्थभोक्ता । श्रोता असावा शंकाघेता ।
निर्मत्सरी निरभिमानता । प्रेमळ आणि भाविक ॥ ७० ॥
ऐसें हें श्रोतृवंदन । पुढें देशकालवर्णन ।
उत्पत्तिस्थितीसि कारण । मूळमाया नाथिली ॥ ७१ ॥
भूत भूतांते प्रसवे । आपणहि नांदे त्यांसवें ।
भूतें भूतांसींच खावें । तेथील तेथें विलीन ॥ ७२ ॥
मूळमाया प्रकृतिपुरुष । पुरुषबिंब परमांश ।
बिंबध्यानें मायानिरास । करावा बिंबासहित ॥ ७३ ॥
जेथें जे निर्माण होतें । तेथेंचि तें लीन होतें ।
मातीस माती मिळते । ऐसे वदती सर्वत्र ॥ ७४ ॥
तैसें या मायेचे पोटीं । सत्त्वस्नेहें ज्ञानदिवटी ।
उजळितां जाळील ही मठी । मूल बापास मारील ॥ ७५ ॥
व्हावया सात्त्विक ज्ञान । देशकालादि साधन ।
सात्त्विक ज्ञानें समाधान । साच आहे ॥ ७६ ॥
राक्षसी मानवी आणि दैवी । त्रिविध माया जाणावी ।
फशीं पाडिते गोसावी । थोरथोर ॥ ७७ ॥
त्यांत एकचि ज्ञानबिंदु । समूळ आटवील भवसिंधु ।
भक्ति-उपासना-संबंधु । घडलिया सतत ॥ ७८ ॥
असो माया कैसी मोहविते । ज्ञान कैसें जागविते ।
हें पहावें जी निरुतें । अवतारमालावर्णनीं ॥ ७९ ॥
एकाची तों ऊर्ध्वगति । एकाची असे अधोगति ।
हे जाणोनियां श्रोतीं । उचित तेंचि घेत जावें ॥ ८० ॥
जरी पाहिजे उत्तम गुण । तरी संतचरित्र हें दर्पण ।
दाविलें पुढती पाहोन । अवगुण धुवोनि काढावे ॥ ८१ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय तेरावा
समास दुसरा

द्वितीयाध्यायीं ऐशी कथा । देशकालादि अनुकूल असतां ।
प्रयत्नें मानव ईशसत्ता । निःसंशय मिळवितसे ॥ १ ॥
कुल शील असतां भलें । तरीच ऐशी सत्ता चाले ।
वनीं जन्मती जंबूकपिलें । गज कैसे विदारित ॥ २ ॥
याकारणें कुल शील । राखावें अति निर्मल ।
विषयलालसेनें केवळ । घात न करावा पुढिलांचा ॥ ३ ॥
चतुरें पाया घातला । मध्यें आपणां भाग आला ।
तरी न ठेवावा ढिला । पुढिलांसी घातक ॥ ४ ॥
लक्ष्मीचा दु‍आंगी टोला । नीतीनें पाहिजे सोसला ।
येतां मदें धुंद केला । जातां तृष्णा मोह पाडी ॥ ५ ॥
प्रारब्धयोगें द्रव्य येतां । बहुत चाले त्याची सत्ता ।
तेणें जननिंदा दोषवार्ता । विसरोनि जोडी अधर्म ॥ ६ ॥
अथवा दैवें दारिद्र्य आलें । आणि वैराग्य नाहीं बाणलें ।
विषयतृष्णें व्याकुळ केलें । धर्माधर्म पाहवेना ॥ ७ ॥
असो संपत्ति अथवा विपत्ति । दोन्हीं ठायीं चित्तवृत्ति ।
शांत ठेवोनि नीति । राखितां बरें ॥ ८ ॥
परमार्थ साधावा मुख्यत्वें । प्रपंचहि करावा दक्षत्वें ।
लिंगोपंत-रावजींचीं तत्त्वें । सूक्ष्मपणें विवरावीं ॥ ९ ॥
सूर्योदय होईल पुढती । परि आधी प्रभा पैसावती ।
तैसे दृष्टांत डोहळे होती । शुभाआधीं शुभशकुन ॥ १० ॥
धर्मस्थापनेचे नर । केवळ कारणिक अवतार ।
परि वेश तैसा आचार । अंगीकारिती अत्यादरें ॥ ११ ॥
असो मानववेशांत । अवतार घेती सद्‌गुरुनाथ ।
सुकृतें फळा आली समस्त । गीता रावजी धन्य केले ॥ १२ ॥
सुपुत्र पित्याचा उद्धार । मोकळें करी स्वर्गद्वार ।
परि स्वर्गाहून जें पर । तेथें स्वयेंचि कष्टावें लागे ॥ १३ ॥
मायोद्भ व लोभ अहंता । नसताचि घालिती गोता ।
तेणें जीव सुखदुःखभोक्ता । होतो ऐसें जाणावें ॥ १४ ॥
बाळलीला तृतीयाध्यायीं । पहा कैसी नवलाई ।
सत्यज्ञाना नाश नाहीं । अनंत जन्म घेतलिया ॥ १५ ॥
प्रवृत्तिज्ञान नाशिवंत । जेथील तेथें लया जात ।
याकारणें निवृत्तिज्ञान सत्‌ । आत्महिता धरावें ॥ १६ ॥
नरदेहीं वसति थोडी । न भरे ब्रह्मयाची घडी ।
याकारणें शाश्वतजोडी । अतियत्नेंम साधावी ॥ १७ ॥
साखर शोधित मुंग्या जाती । तैसी बालपणींच वाढली महंती ।
आणिक एक धरा चित्तीं । मंत्रदीक्षा ॥ १८ ॥
आत्महित साधायासी । आचार कथिती देव ऋषि ।
अदूरदृष्टी निरर्थक त्यासी । मानोनि अव्हेर न करावा ॥ १९ ॥
वेदबीज मंत्रबीज । ज्ञानबीज धर्मबीज ।
वेल मुळीं वासनाबीज । शुद्ध भूमिके रुजलिया ॥ २० ॥
उपदेशक असावा ज्ञाता । अपरोक्षानुभवी पुरता ।
तरी घडे सार्थकता । उपासनाबळें ॥ २१ ॥
यांतील एकही असतां उणें । वैराग्य कदापी न बाणे ।
मां समाधान कोण जाणे । कैसें आहे ॥ २२ ॥
आचार शुद्ध विचार शुद्ध । भूमिका शुद्ध संगति शुद्ध ।
तरीच हें होईल साध्य । वेदगुह्य ॥ २३ ॥
परि कालधर्म उफराटा । ब्रह्मकर्मा दिधला फांटा ।
यास्तव ज्ञानियाच्या वाटा । शोधूं निघाले ॥ २४ ॥
अनुताप उपजला पोटीं । वैराग्य बाणलें उठा‍उठीं ।
परि मायबापांसाठीं । गृहस्थाश्रम आदरिला ॥ २५ ॥
मायबाप अधिदैवत । हेंहि दाविलें नेमस्त ।
आणि आपुलाहि स्वार्थ । साधावया कष्टले ॥ २६ ॥
एक असतां एक नाहीं । ऐसें असतें बहुतांठायीं ।
परि ज्ञानी सर्वत्र विदेही । जळीं राहोन कोरडा ॥ २७ ॥
तृतीयाध्यायाचें अंती । घराबाहेर निघाला गणपती ।
मायामोहाची गुंती । अल्पवयीं सोडविली ॥ २८ ॥
चतुर्थाध्यायींचा प्रसंग । दाविले विवेक वैराग्य ।
कैसा अनुताप तगमग । भरतखंड शोधिलें ॥ २९ ॥
सद्‌गुरु शिष्यातें परीक्षी । सच्छिष्य सद्‌गुरु लक्षी ।
अलिप्तपणे गरुडपक्षी । साध्य जैसा शोधितसे ॥ ३० ॥
उपमर्द कोणाचा न केला । वाद कोणासी न घातला ।
सूक्ष्मदृष्टीं जगताला । शोधूं लागले ॥ ३१ ॥
काम क्रोध दंभ अहंता । लोभ तृष्णा दुस्तर ममता ।
त्यजोनि विवेकवैराग्यें मलिनता । चित्ताची घालविली ॥ ३२ ॥ साधोनिया चित्तशुद्धि । लीन होतां गुरुपदीं ।
प्रसाद व्हावया अवधि । पळभरी नाहीं ॥ ३३ ॥
असो नामस्मरण तीर्थाटन । संतदर्शनें उपोषण ।
ऐसें करीत साधन । समाधान शोधिलें ॥ ३४ ॥
पंचमाध्यायप्रसंगीं । तुकाराम महायोगी ।
तेथें लीन सर्वांगीं । होवोनि केलें सार्थक ॥ ३५ ॥
सरिता सागरीं मिळाली । द्वैतभावना अवघी गेली ।
परि वळण लावावया केली । गुरुसेवा बहुविध ॥ ३६ ॥
निर्गुणीं व्हावें अनन्य । सगुणीं सगुणत्वें भजन ।
हेंहि दाविलें वळण । स्वयें सेवा करोनी ॥ ३७ ॥
ज्ञानें होती परमहंस । परि सगुणीं उदास ।
ऐशियानें जगतास । काय बोध होईल ॥ ३८ ॥
ऐसे बहुत साधु झाले । आपआपणापुरते तरले ।
परि ही नौका अखंड चाले । बहुतांसी तारक ॥ ३९ ॥
असो कठिण सेवा केली । गुरुमाय आनंदविली ।
कसासी वृत्ती न डगली । लेशमात्र अहर्निशीं ॥ ४० ॥
सुखासनीं सुग्रासभोजनीं । वेदान्त वदोनि म्हणती ज्ञानी ।
परि मायाकसोटी घर्षणीं । उतरणें कठिण आहे ॥ ४१ ॥
भ्याड बहु वल्गना करी । प्रसंग आल्या अंग चोरी ।
ऐसियानें माया आसुरी । मरणार नाहीं ॥ ४२ ॥
जगदुद्धार करावयासी । आज्ञापिती ज्ञानराशी ।
पोई घातली तृषितांसी । शांतवाया निःस्वार्थें ॥ ४३ ॥
अज्ञ सुज्ञ भेद इतुका । अज्ञ परार्थीं न वेचीं तुका ।
ज्ञानियाचा प्रपंच देखा । केवळ परहिताकारणें ॥ ४४ ॥
सहावियांत तीच कथा । प्रपंचीं दाविली विदेहता ।
नाना जीवां आश्रयदाता । इहपर सौख्य दाविलें ॥ ४५ ॥
निःस्वार्थें प्रपंच केला । घराचा देव्हारा बनविला ।
पाकगृहाची धर्मशाळा । केली समस्तांकारणें ॥ ४६ ॥
हजार येती हजार जाती । खाती पिती सुखी होती ।
मूढ ज्ञानी एका पंक्ती । बैसविले निरहंकारें ॥ ४७ ॥
तारक नामस्मरणासी । लाविले लहानथोरांसी ।
नाना प्रपंचव्याधींसी । दिधल्या दूर झुगारुनी ॥ ४८ ॥
संसारचक्रीं जे भ्रमले । आपत्तीनें कष्टी झाले ।
बहुत पीडतां कुरवाळिले । गुरुमाउलीनें ॥ ४९ ॥
अन्नदान सौख्यदान । त्याहीवरी ज्ञानदान ।
तेंहि परिसा सज्जन । सप्तमाध्यायीं ॥ ५० ॥
काळवेळा कठिण आली । सदसद्विवेक बुद्धि गेली ।
महामायेनें भुलविली । नानाप्रकारें ॥ ५१ ॥
इच्छामात्रें सकळ घडी । निमिषार्धें करी बिघडी ।
नाथिली परि कोडी । अनंत अगाध ॥ ५२ ॥
माया महान वटवृक्ष । शाखापल्लव गणितां लक्ष ।
बीजरूपें अनंत वृक्ष । शोधितां पुढतीं धांवतसे ॥ ५३ ॥
याची गणना होणें नाहीं । पाहिलें तेंहि शाश्वत नाहीं ।
अष्टधेचा कर्दम पाहीं । अनंत चमत्कृति मोहक ॥ ५४ ॥
मोहें भुलविला जनांस । परमार्थीं पाडिले ओस ।
शुद्ध ज्ञान लयास । जाऊं लागले ॥ ५५ ॥
माया सोडितां सुटेना । धरितां हातीं लागेना ।
इहपर कांहींच साधेना । मानवासी ॥ ५६ ॥
शुद्धज्ञानें मायानिरास । इहपर साधेल स्वहितास ।
ज्ञानरूप सद्‌गुरु परेश । पाहोन चरणीं लागावें ॥ ५७ ॥
यास्तव सद्‌गुरुओळख । कथिली परिक्षा निष्कलंक ।
काळवेळ पाहोनि देख । व्यवहारसाधन कथियेलें ॥ ५८ ॥
स्वल्प परि अर्थें जाड । कथन केलें गुह्य गोड ।
अनुभवज्ञान नव्हे वाड । शब्दावडंबर निरर्थक ॥ ५९ ॥
शब्दज्ञानी घरोघरी । अनुभवी क्वचित् गिरिगव्हरीं ।
उथळ जळा खळखळ भारी । डोह शांत गंभीर ॥ ६० ॥
सप्तमाध्याय करोनि पठण । ठेवितां तैसें आचरण ।
दुस्तरकाळीं भवतरण । होईल जाणा निश्चयें ॥ ६१ ॥
क्रिया करोनि दाविली । तीच जनां उपदेशिली ।
रसाळ मधुर फळें आलीं । तीं कथिलीं अष्टमीं ॥ ६२ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥ 

अध्याय तेरावा समास तिसरा

सद्‌गुरुपदीं लागतां । अनन्यभावें सेवा करितां ।
भवसिंधु होईल तरता । सच्छिष्य जाणावा ॥ १ ॥
शिष्य सद्‌गुरु होईल । भेद मुळींचा विरेल ।
मानव करणी कराल । तरीच होय जगदात्मा ॥ २ ॥
कलीं परमार्थ गहन । म्हणोन न व्हा उदासीन ।
प्रयत्नेंर प्राप्त निधान । दुर्लभ तेंचि साधावें ॥ ३ ॥
कोणी म्हणती संचित नाहीं । संचित पूर्वठेवा पाहीं ।
कष्टें सांठविला जिहीं । तयांसीच तो लाभतसे ॥ ४ ॥
एवं प्रयत्नव हेंचि सार । सत्संग तयासि आधार ।
येणेंचि तरले नर । तरती, पुढें तरतील ॥ ५ ॥
लहानथोर कथिले भक्त । जे जे गुरुपदांकित ।
एक वस्ति दों वसति जात । कोणी पावले मुक्कामीं ॥ ६ ॥
मार्ग चालूं असतां कांही । इच्छित ठाव दुर्लभ नाहीं ।
अडचणी गुंता पडतां पाहीं । गुरुमाय हात देतसे ॥ ७ ॥
मार्गीं देहादि वसति ठाव । उणें अधिक भोगी जीव ।
साधनी असावा उत्साह । उणें अधिक मानूं नये ॥ ८ ॥
गुरुभक्तांच्या जाती दोन । सकाम निष्काम करिती भजन ।
यास्तव थोर आणि सान । कथन केले अवधारा ॥ ९ ॥
परि श्रींची हातवटी । सकामिया नैष्कर्म्य पोटीं ।
बोधोन नेती उफराटीं । भाविकांसी निजपंथें ॥ १० ॥
जन्म हेंचि पातक गहन । तैशा वासनाही सघन ।
परि हंसदृष्टि जाण । क्षीर तितुकें सेविलें ॥ ११ ॥
आणिक एक जाणणें । लक्षांमाजी एक जाणे ।
क्वचित हातीं येईल केणें । सद्वस्तु कष्टसाध्य ॥ १२ ॥
तैसे समर्थांचे सेवक । असती जरी न्यूनाधिक ।
तरी वंद्यचि निःशंक । राजमुद्रे मोल चढे ॥ १३ ॥
असो ऐसें अष्टाध्यायीं । ठेवी प्रस्तुत पुण्याई ।
तेचि जडले गुरुपायीं । नमन करूं साष्टांगे ॥ १४ ॥
नवमाध्यायीं गोरक्षण । तैसेंचि कथिले अन्नदन ।
राममंदिरें स्थापून । सत्कर्मपोयी घातल्या ॥ १५ ॥
गोमाहात्म्य वर्णिले न वचे । इहपरहित मानवांचें ।
सद्धर्म आणि सुभिक्षेचें । साधन हें सभाग्य ॥ १६ ॥
अन्नदान अतिथीपूजा । परमसंतोष गरुडध्वजा ।
आदरें करोनि गुरुराजा । समस्तांसी बोधितसे ॥ १७ ॥
अन्नपूर्णा पाकशाळे । सदा दावी निजसोहळे ।
शतसहस्र येतांही निराळे । उणें पडों नेदीच ॥ १८ ॥
कुबेर राहे श्रींचे घरी । आले अतिथी आदरी ।
जेथें प्रत्यक्ष श्रीहरी । उणें काय त्या ठायां ॥ १९ ॥
ऋणमुक्त केले किती । मुंजी-विवाहां नसे मिती ।
धेनु बहुमोलें घेती । हिशेब कोणा कळेना ॥ २० ॥
जितुक्या येती सुवासिनी । खण देती तयांलागोनि ।
बालकां अंगीटोपी करोनी । प्रेमभरें बोळविती ॥ २१ ॥
ब्रह्मचारी संन्यासी । बैरागी तडीतापसी ।
वस्त्रें देती तयांसी । ज्याचे त्यापरी ॥ २२ ॥
तेथें नांदे गणपति । जो विद्यावंतांचा अधिपति ।
अनेकांच्या शंका फेडिती । साधार स्वानुभवें ॥ २३ ॥
भूतभविष्य जाणोनि । प्रत्युत्तर दे गुरुजननी ।
उणें अधिक चापपाणी । होवोंच नेदी ॥ २४ ॥
इतुक्या असोनिया कळा । वेष अत्यंत साधासरळा ।
अखंड शांतीचा जिव्हाळा । ऊर्मिरहित ॥ २५ ॥
बहुत येती निंदक । नीचोत्तरें बोलती अनेक ।
शांत राहोन गुरुनायक । समाधान करिती तयांचें ॥ २६ ॥
कांहीं धूर्त परीक्षूं येती । स्थिति पाहोन चकित होती ।
प्रेमभावें शरण निघती । धन्य साधु म्हणोनी ॥ २७ ॥
सामर्थ्य असोन लीनता । सर्वां भूतीं दयार्द्रता ।
अहंकार सारोनि परता । सानपणा आंगीकारिती ॥ २८ ॥
म्हणती ’आम्ही माणदेशी शेतकरी । रामदासी केवळ भिकारी ।
कुटुंबवत्सल संसारी । मुमुक्षुजन ॥ २९ ॥
लोकीं उठविलें बंड । साधुत्वाचें घेती कुभांड ।
येरवीं सर्व थोतांड । तुम्ही आम्ही सारखे’ ॥ ३० ॥
मूर्तिमंत ज्ञानघन । आदि-मध्यांत अविच्छिन्न ।
परि पांघरोन अज्ञान । पोरांसवें खेळती ॥ ३१ ॥
कुणबटासी कुणबट गोष्टी । करिती जुनाट मराठी ।
ज्ञान्यासी ज्ञानभेटी । भाविकासी भाविक ॥ ३२ ॥
योगाभ्यासियासी योग । षट्चक्रभेद अष्टांग ।
धमनित्रय भ्रमरमार्ग । दावोनि देती वायूचा ॥ ३३ ॥
सर्वज्ञासी काय उणें । जे जे येतील शहाणे ।
तितुकियांची समाधानें । करिती बहु आदरें ॥ ३४ ॥
असो ऐसीं बहुत चित्तें । शांतवोनि लाविलीं भक्तीतें ।
दुस्तर कलिमाजीं निरुते । उपकार केले अगणित ॥ ३५ ॥
दशम एकादशांत । हेंचि ध्यावें जी सतत ।
आणिक अवतार समाप्त । जाणा येथें वर्णिला ॥ ३६ ॥
बहुत जनां लाविला लळा । प्रेमतंतूचा जिव्हाळा ।
गुरुचि देव राउळा । मानोनि गळां पडतील ॥ ३७ ॥
ज्ञानचक्षु क्वचितांसी । ते जाणती गुरुपदासी ।
एरवीं सर्व सगुणासी । भजती भावभक्तिनें ॥ ३८ ॥माय बाप सुत जाया । याहून श्रीचरणीं माया ।
देहत्यागीं शोकत्रस्त होतील बाया । नर आणि बालकें ॥ ३९ ॥
यास्तव दूर धाडिले । येत्यांसि अडथळे घातले ।
सगुणरूप लोपविलें । निर्गुणीं झाले विलीन ॥ ४० ॥
काशीपासोन रामेश्वर । बहुत करविला नामगजर ।
असंख्य तारिले नर । ख्याती झाली चहूंदेशी ॥ ४१ ॥
आणिक एक कार्य केलें । देशासि जें दौर्बल्य आलें ।
पारतंत्र्यें विकळ केलें । पिळपिळोनी काढिलें ॥ ४२ ॥
यासी सबळ कारण । पाप भरलें अतिगहन ।
दुःखमूळ दुरित जाण । श्रुतिस्मृति बोलती ॥ ४३ ॥
हरिस्मरणेंदुःखें जाती । हरिस्मरणें पापें जळती ।
याकारणें नामजपाप्रति । लाविले लक्षानुलक्ष ॥ ४४ ॥
शुद्ध भूमिका निर्मळ बीज । असलिया सुफळें येती सहज ।
तेंहि पुढें दिसेल काज । यथाकाळीं यथाक्रमें ॥ ४५ ॥
दशरथें तप केलें । तेव्हां रामचरण लाभले ।
भाग्यवान पुरुष झाले । शुद्धभूमिकेपासोनी ॥ ४६ ॥
असो पुढील कार्य जें होणें । तें एक श्रीगुरु जाणे ।
लखोटा लिहूनियां जेणें । ठेविला स्वहस्तींचा ॥ ४७ ॥
पक्कें मोर्तब करोनि । वरि लिहिलें श्रींनी ।
मजवांचोनिया कोणी । फोडूं नये लखोटा ॥ ४८ ॥
दुरितनाश कार्यकारण । तप करविलें नामस्मरण ।
इहपरहित करोन । समाधिस्थ जाहले ॥ ४९ ॥
द्वादशाध्यायीं समाधीवर्णन । कथिलें परिसा जी सज्जन ।
जेणेंयोगें समाधान । वैराग्ययुक्त होतसे ॥ ५० ॥
ब्रह्मचैतन्य परात्पर । अखंड अक्षय चरचर ।
संचले रितें अणुभर । स्थान पाहतां गवसेना ॥ ५१ ॥
त्यांही विशेष स्थानें । परिसा जी सद्‌गुरुवचनें ।
गुरुवचनीं विश्वास धरणें । निजकर्तव्य शिष्याचें ॥ ५२ ॥
अखंड वास भक्त हृदयीं । जेणें चित्त अर्पिलें गुरुपायीं ।
नामजप जेथें पाही । तेथें वास श्रीगुरूंचा ॥ ५३ ॥
जेथें नामोत्साह चालती । आदरें प्रसाद अर्पिती ।
तेथें वास गुरुमूर्ती । न्यून पडो देईना ॥ ५४ ॥
संकटकालीं भक्तीनें । बाहती श्रींसी करुणावचनें ।
तया स्थळीं धांवोनि जाणें । श्रीगुरु मायबाप ॥ ५५ ॥
सच्छिष्य जेथे स्थापना करी । अनंत भावना एकसरी ।
जडल्या तेथें भक्तकैवारी । वसती नित्य निर्लिप्त ॥ ५६ ॥
जेथें श्रींच्या पादुका । भक्त पूजिती भावें देखा ।
तेथे वास गुरुनायका । साच साच जाणावा ॥ ५७ ॥
मायबापांची करितां सेवा । तेथें गुरूंसी विसावा ।
आणिक प्रकार परिसावा । गुरुभक्तांचे संगमीं ॥ ५८ ॥
सद्‌गुरुलीला जेथें वर्णिती । लिहिती वाचिती पूजा करिती ।
भक्तिभावें सेवा करिती । साह्य तयांसी सर्वदा ॥ ५९ ॥
गोंदावलींची मुख्य स्थानें । परिसा जी निर्मलमनें ।
’शेजगृहीं असे माझें नित्य राहणें’ । ऐसें वदले आम्हां श्रीगुरु ॥ ६० ॥
समाधि साक्षात्‌ गुरुरूप । प्रगट गुप्त भेद अल्प ।
अनेकांचा हरती ताप । साक्षात्कार घडोघडी ॥ ६१ ॥
अनेकांच्या कामना पुरती । कित्येकांसी ज्ञानप्राप्ति ।
अनेकां साधनें सुचविती । यथाक्रम यथान्याय ॥ ६२ ॥
दर्शनें सकलां होय समाधान । जेवीं प्रत्यक्ष दर्शन ।
येविषयीं स्वानुभव जाण । कथन करूं तुम्हांसी ॥ ६३ ॥
श्रींनी केला देहत्याग । वियोगें जाहला उद्वेग ।
समाधिदर्शनें अभंग । गुरुमाय भेटली ॥ ६४ ॥
वरी जीं जीं कथिली स्थानें । अनुभवियां खूण बाणे ।
कांहीं दृष्टांत इतरांकारणें । कथन करूं अवधारा ॥ ६५ ॥
समाधीचे तिसरे दिवशी । अनुग्रह दिधला द्रविडांसी ।
दृष्टांतहि बहुतांसी । होती बहुविध प्रकारें ॥ ६६ ॥
वाराणसीं विप्रबाळ । बुडतां आठवी गुरु दयाळ ।
हात देवोनि तीराजवळ । आणोनि जीव वांचविला ॥ ६७ ॥
जालनेकरांचे जामात । पांडुरंगबुवा परम भक्त ।
बदरीनारायण तीर्थाप्रत । जाऊन मागें परतले ॥ ६८ ॥
तेव्हां हृषीकेशाचें दर्शन । पुढें चट्टी सत्यनारायण ।
तेथें घोर कानन । व्याघ्र मार्गीं आड आला ॥ ६९ ॥
गुरगुर करी वांकुल्या दावी । अत्यंत भय वाटलें जीवीं ।
तेव्हां आठविले गोसावी । ब्रह्मचैतन्य सद्‌गुरु ॥ ७० ॥
शरणागता अभयदाते । साक्षात्‌ प्रगट झाले तेथें ।
वदती ’व्याघ्र काय करील तूतें । शिरीं असतां रामराय’ ॥ ७१ ॥
असो व्याघ्र निघोनि गेला । ऐसा भक्तसंकटीं सद्‌गुरु धांवला ।
स्थिरचर व्यापून राहिला । जगदात्मारूपें ॥ ७२ ॥
आणिकहि बहुतांसी । साक्षात्कार बहुवसी ।
झाले परि ग्रंथासी । विस्तार होईल ॥ ७३ ॥
जैसा भाव तैसा देव । हाचि मुख्य अभिप्राव ।
अंतर्बाह्य गुरुराय । येत ना जातसे ॥ ७४ ॥
घटीं आकाश पाहिलें । तें गोलाकार भासलें ।
तैसे सद्‌गुरु नटले । भावनेसारिखे ॥ ७५ ॥
द्वादशाध्याय मुक्तामाला । त्रयोदश मेरु आगळा ।
गुरुकृपामृत जिव्हाळा । अखंड आकंठ पान करूं ॥ ७६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय तेरावा
समास चवथा

॥ श्रीसद्‌गुरु श्रीब्रह्मचैतन्यमहाराजाय नमः ॥
नमो पुरुषा गणपति । शारदा सुविद्या प्रकृति ।
नमो स्वयंसिद्ध ज्योति । चैतन्यब्रह्म ॥ १ ॥
नमो सकळ श्रोतेजन । धन्य तुमचे कृपादान ।
वारंवार प्रोत्साहन । देऊन ग्रंथ वदविला ॥ २ ॥
ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ति । उपजली कोणे रिती ।
कोणपरीनें समाप्ति । जाहली ती परिसावी ॥ ३ ॥
घेतां श्रींनी समाधि । तीन संवत्सवें गेली अवधि ।
परि श्रीचरित्रासंबंधी । कोणी कांहींच बोलेना ॥ ४ ॥
श्रींचे शिष्य ज्ञानी । एकाहूनि एक द्विगुणी ।
प्राचीन अर्वाचीन दोन्ही । शास्त्रांमाजी प्रवीण ॥ ५ ॥
कांहीं अपरोक्षज्ञानी सिद्ध । जयांवरी सद्‌गुरुप्रसाद ।
अधिकारी मठपति प्रसिद्ध । संप्रदाय वाढविते ॥ ६ ॥
परि कारण तें वेगळें । कांहींनी लिहो आरंभिलें ।
तयां श्रीगुरु वदले । ’लिहूं नये कोणीहि ॥ ७ ॥
ग्रंथ लिहिणार वेगळा असे । तो लिहील अनायासें ।
उचित काळीं पहा खासें । तुम्ही स्थिर रहावें’ ॥ ८ ॥
ऐसी झाली मागें भाक । तेणें स्थिर सकल लोक ।
नातरी एकाहून एक अधिक । ज्ञानी चतुर गुरुभक्त ॥ ९ ॥
आणिक एक मुख्य कारण । आत्मश्लाघा निष्कारण ।
श्रवणीं न पडावी म्हणोन । आज्ञा न देती कवणासी ॥ १० ॥
तो काल निघोनि गेला । परि भाव तैसाचि उरला ।
आज्ञा नसे कवणाला । प्रसाद कोणा कळेना ॥ ११ ॥
कोणी प्रयत्नण करूं जातां । तया निवारिती सर्वथा ।
तुम्हांसि नसे पात्रता । पुण्यपुरुष पाहिजे ॥ १२ ॥
माहिती कोणा न देती । प्रसंग आल्याहि छपविती ।
स्फूर्तिदाते गुरुमूर्ति । दोष नसे कवणाचा ॥ १३ ॥
असो इतुक्याहि प्रसंगांत । आम्हां स्फूर्ति अवचित ।
झाली परि वदाया मात । वाव कोठें दिसेना ॥ १४ ॥
विद्या नाहीं दीक्षा नाहीं । सहवास बहुत केला नाहीं ।
वैभव मान्यता कांहींच नाही । स्फूर्ति मात्र दुणावली ॥ १५ ॥
श्रीसमाधीनंतर । ब्रह्मानंद भक्त थोर ।
गुरुरूप मानिती साचार । सकलहि गुरुभक्त ॥ १६ ॥
तयांसि कैसें पुसावें । सूर्यापुढती जैसे काजवे ।
स्वयें कैसें प्रकाशावें । श्लाघ्य नोहे ॥ १७ ॥
यास्तव चरित्रदिग्दर्शन । “नमस्कारत्रयोदशी” म्हणोन ।
श्लोक रचिले हेतु धरोन । चरित्र लेखनाचा ॥ १८ ॥
ते हरिदास यांचेकरवीं । दावोनि आज्ञा घेतली बरवी ।
तेणें प्रफुल्लता आली नवी । स्फूर्तीसि सिद्धवाक्यें ॥ १९ ॥
या‍उपरी औदासिन्य । माहिती‍अभावी आले गहन ।
गुरुभक्त न उघडिती वदन । तेंहि एकें दूर केलें ॥ २० ॥
कागवाडकर रामदासी । पत्र देती हरिदासांसी ।
उभयतां मिळोन मजसी । साह्य केलें मनोभावें ॥ २१ ॥
कांहीं ग्रंथ पाहिल्यावरी । प्रासादिक वदलीं सारीं ।
मग माहिती उपरि । कांहीं देवों लागले ॥ २२ ॥
गोखले उपनामी भले । लेखनसाहित्य त्यांनी केलें ।
बहुतीं प्रोत्साहन दिलें । वरी छाया गुरुकृपा ॥ २३ ॥
शके अठराशें चाळीस । पुण्यतिथि मार्गशीर्ष ।
ग्रंथारंभ गोंदावलीस । श्रीसन्निध जाहला ॥ २४ ॥
बुधग्रामीं साग्र लिहिला । श्रीकृपें पूर्ण झाला ।
अठराशें त्रेचाळिसाला । अर्पण केला गुरुचरणीं ॥ २५ ॥
श्रीकृपेचीं उत्तरें । वेडींवांकुडीं लिहिलीं बरें ।
सेवन करा क्षीरनीरें । हंसदृष्टि ठेवोनि ॥ २६ ॥
बहुत मतें एकवटोनी । कांहीं स्वानुभव घेवोनी ।
कथा लिहिल्या ग्रंथसदनीं । सत्य आणि निवडक ॥ २७ ॥
सद्‌गुरुलीला अनंत अपार । काव्य काय उतरील पार ।
कांही सत्य आणि साधार । असती त्या घेतल्या ॥ २८ ॥
क्वचित्‌ शब्द भेद झाला । तरी बाध न ये तत्त्वाला ।
तत्त्वदृष्टि घेऊन चाला । श्रोतेजन भाविकहो ॥ २९ ॥
घुगरदरे सोलापूरकर । श्रींचे आप्त आणि चतुर ।
यांनींहि चरित्र मधुर । गद्य लिहिलें श्रींचे ॥ ३० ॥
धीट पाठ प्रासादिक । करिती गद्यपद्यात्मक ।
श्रींचे दरबारीं अनेक । सेवाकरिती यथाशक्ति ॥ ३१ ॥
आरती सवाई अष्टक । पद अभंग आणि श्लोक ।
भूपाळ्या गद्येंहि अनेक । भक्त स्तविती श्रीगुरु ॥ ३२ ॥
कोकिळकंठ प्रेमळ वाणी । रूप लावण्य इंद्रियें देखणीं ।
कवित्वशक्ति चातुर्यखाणी । देणें भगवंताचें ॥ ३३ ॥
कांही असती उपजत ज्ञानी । एकपाठी असती कोणी ।
सरळ नासिका गौरवर्णी । देणें भगवंताचें ॥ ३४ ॥
राजयासी पुत्र झाला । आणि पांगुळाच निपजला ।
ही ईश्वरकरणी, तयाला । मानव बापुडें काय करी ॥ ३५ ॥
हिरण्यकश्यपूसि प्रल्हाद । हा ईश्वरी प्रसाद ।
सुरुरिपुच्या गृहीं शुद्ध । देवभक्त निपजला ॥ ३६ ॥
तैसें साधन ना भजन । नाहीं केलें शास्त्रध्ययन ।
परि गुरुकृपा गहन । देणें भगवंताचें ॥ ३७ ॥
कर्ता तो वेगळाचि असे । देहबुद्धि लावी पिसें ।
अहंकार माथां बैसे । अधोगतीसी न्यावया ॥ ३८ ॥
भाग्यें कामधेनू आली । तेणें संपत्ति दुणावली ।
कृपणत्वें खादाड दिसली । मग मांडिला विक्रय ॥ ३९ ॥
धेनु धन सकल गेलें । दैन्यवाणें उगाचि शिणलें ।
यास्तव देहबुद्धिवेगळें । साधकें असावें ॥ ४० ॥
तैसी ही प्रसादवाणी । लिहविता सद्‌गुरु धनी ।
गुरुबंधू आयतनीं । कथा कथिते ॥ ४१ ॥
लेखक द्विज चित्पावन । ऋग्वेद शाखा आश्वलायन ।
अत्रि गोत्र फडके म्हणून । उपनामें संबोधिती ॥ ४२ ॥
वासस्थान तासगांव । विष्णु यशोदा जनकदेव ।
गोपाल ऐसें वदती सर्व । तुम्हीं श्रोते जाणावें ॥ ४३ ॥
रामदासीबुवा ऐसें । सद्‌गुरुमाय संबोधीतसे ।
ग्रंथी निर्देश तोचि असे । श्रोतीं आक्षेप न धरावा ॥ ४४ ॥
वामनबुवा मठ मोरगिरी । सद्‌गुरुसेवा मागोन बरवी ।
शुद्ध लिपि लिहोनि सत्वरीं । बहुपरी साह्य केलें ॥ ४५ ॥
ग्रंथ नव्हे हा प्रचीन । ना ही सरणी अर्वाचीन ।
कोणा दिसे अधिकन्यून । तरी क्षमा असावी ॥ ४६ ॥ग्रंथ नव्हे सुलभ गद्य । ग्रंथ नव्हे गूढपद्य ।
वेडेवांकुडे दोन शब्द । गुरुचरणीं अर्पिले ॥ ४७ ॥
शृंगार हास्य शोकादिक । रस जे रजतमात्मक ।
साधका होती बाधक । ते येथें वर्जिले ॥ ४८ ॥
भक्तरस सत्त्वप्रधान । सद्‌गुरूचा महिमा गहन ।
उपदेशवचनें प्रमाण । घेतलीं संतौच्छिष्टें ॥ ४९ ॥
वेदांत सिद्धांत धादांत । नीतिव्यवहार परमार्थ ।
गुरुभक्तांचा अनुभव येथे । सत्य शोधोनि वर्णिला ॥ ५० ॥
गुरुलीला ही साधार । परि कांहीं सोडिला प्रकार ।
जेणें दुखवेल परांतर । ऐसे दृष्टांत त्यागिले ॥ ५१ ॥
कांहीं भाग लिहिला होता । परि दृष्टांत होय अवचितां ।
निंदकाचें कृत्य वर्णितां । लाभ काय तुम्हांसी ॥ ५२ ॥
असो प्रत्यक्ष असतां श्रीगुरुवर । निंदकां करिती उपकार ।
तैसाच ग्रंथगर्भीं प्रकार । गुरुआज्ञेनें जाहला ॥ ५३ ॥
गुरु दयेची माउली । गुरु शांतीची साउली ।
गुरु आनंदा घरकुली । गुरु माय सर्वांची ॥ ५४ ॥
षड्गुआणैश्वर्यसंपन्न । सद्‌गुरु माझें निधान ।
भक्तांसि सदा प्रसन्न । स्वानंदरस वर्षतसे ॥ ५५ ॥
असो माहात्म्य श्रीगुरूंचे । शब्दातीत अगम्य वाचे ।
म्यां शब्दस्वरूप दिधले काचें । म्हणून क्षमा भाकितों ॥ ५६ ॥
सद्‌गुरुचि एक बुद्धिदाता । कर्ता वक्ता आणि श्रोता ।
सूक्ष्म देहअगहंता । समरस होवों गुरुचरणीं ॥ ५७ ॥
जें जें कांहीं घडे कर्म । तें तें अर्पावें हा धर्म ।
तैसी अहंताहि दुर्गम । श्रीसेवे लाविली ॥ ५८ ॥
समर्थ सद्‌गुरूंची कीर्ति । साधकां मार्गदर्शी ज्योति ।
जे कोणी भावें गाती । प्रसाद होय तयांवरी ॥ ५९ ॥
सद्‌गुरुलीला करितां श्रवण । अखंड होय समाधान ।
नाना शंकांचे निरसन । होय येथें ॥ ६० ॥
प्रपंच साधोन परमार्थ । कैसा साधावा निजस्वार्थ ।
हेंहि सद्‌गुरु समर्थ । बोधिती या ठायीं ॥ ६१ ॥
सद्‌गुरुंच्या प्रतिमा अनेक । त्यांहूनि विशेष हें रूपक ।
येथें साक्षात गुरुनायक । वास करिती अक्षरीं ॥ ६२ ॥
वेद तोचि विश्वंभर । तैसी लीला गुरुवर ।
येथें रोकडा साक्षात्कार । भाविकांसी होईल ॥ ६३ ॥
रामायण हरिवंश । पूजितां प्रसन्न जगदीश ।
तेवीं श्रीसद्‌गुरुलीलामृतास । पूजितां गुरुमाय तोषेल ॥ ६४ ॥
या ग्रंथाची करितां सेवा । सद्‌गुरु देईल विसांवा ।
तापत्रयांतून जीवा । सोडवील धरा विश्वास ॥ ६५ ॥
सद्भारवें ग्रंथ श्रवण करितां । जाईल समंध भूतव्यथा ।
चेडेचेटुका वार्ता । न चले येथें ॥ ६६ ॥
देह प्रारब्धाधीन । हें पूर्वींच गेले नेमोन ।
उपाय करितां अधिकन्यून । समर्थकृपें होतसे ॥ ६७ ॥
निपुत्रिकां पुत्रप्राप्ति । दरिद्रियां धनप्राप्ति ।
रोगग्रस्तां रोगमुक्ति । सद्‌गुरुमाय देईल ॥ ६८ ॥
बद्धासी होय अनुताप । मुमुक्षुसि साधन स्वल्प ।
साधकासि ज्ञानदीप । गुरुमाय दावील ॥ ६९ ॥
असतां दृढश्रद्धा विमल भाव । सदा जवळींच गुरुराव ।
मग त्रिविधताप मायोद्भ व । दूर जाती पळिन ॥ ७० ॥
सद्भारवें सेवा करितां । वाहील सद्‌गुरु त्याची चिंता ।
भवसिंधुवरोनि तारिता । युक्तिप्रयुक्ति होईल ॥ ७१ ॥
सेवेचे बहुविध प्रकार । मुख्य श्रवण मनन आचार ।
सप्ताह पूजा नमस्कार । प्रदक्षिणा ही उपांगें ॥ ७२ ॥
कैशी असेल कालगति । जैंसी ज्याची शक्ति मति ।
तैसी भजावी गुरुमूर्ति । परमपावन गुरुलीला ॥ ७३ ॥
सद्‌गुरुमाय दयावंत । भोळा भाव सिद्धीस नेत ।
यास्तव न धरितां किंत । यथाशक्ति आळवावी ॥ ७४ ॥
यावरी श्रोते प्रश्न करिती । सप्ताह करावा कवणे रिती ।
कैसी होय फलप्राप्ति । कथन करावें ॥ ७५ ॥
वक्ता वदे बरवें पुसिलें । वंदन करोनि गुरुपाउलें ।
कथितो अवधान द्या भले । श्रोते तुम्ही भाविक ॥ ७६ ॥
अंतःशुचि बाह्यशुचि । स्थानशुचि द्रव्यशुचि ।
श्रोतृसमुदायशुचि । शक्य तितुकें साधावें ॥ ७७ ॥
निष्काम पाठ मुख्य धर्म । सकाम हा गौणधर्म ।
दोहीं ठायीं हरती श्रम । सद्‌गुरु दयावंत ॥ ७८ ॥
स्नानसंध्या करोनि । भक्तिभावें पूजोनि ।
सोज्ज्वळ दीप ठेवोनि । पाठारंभ करावा ॥ ७९ ॥
प्रत्येक ओवी वाचल्यावरी । ’श्रीराम’ म्हणा सत्वरीं ।
ऐसी प्रति‍ओवीसी वैखरी । श्रीरामीं लावावी ॥ ८० ॥
येणें सद्‌गुरु तोष पावे । येणें फल दुणावे ।
सेतु बांधिला जैसा देवें । तैसा परमार्थ साधेल ॥ ८१ ॥
ही गुरुघरची सरणी । श्रोते नीट धरा ध्यानी ।
प्रतिदिनीं दोन अज्ञाय वाचोनि । नैवेद्य आरती करावी ॥ ८२ ॥
सात्त्विक आहार मृदुवचन । ब्रह्मचर्य नामस्मरण ।
इतुकें होतां तत्काळ विघ्न । गुरुकृपें निरसेल ॥ ८३ ॥
तीन दिनीं अध्याय सहा । चवथे दिनीं सातवा पहा ।
मननयुक्त वाचावा हा । पान करा बोधामृत ॥। ८४ ॥
पुढे तीन दिनपर्यंत । प्रतिदिनीं दोहींप्रत ।
वाचोन सप्ताह समाप्त । सांगता करावी ॥ ८५ ॥
सांगता मुख्यलक्षण । नामस्मरण अन्नदान ।
सात्त्विक द्रव्य मेळवून । यथाशक्ति करावें ॥ ८६ ॥
आषाढ शुद्ध पौर्णिमेसी । अवश्य करा सप्ताहासी ।
गुरुपूजा ते दिवशी । उत्सव प्रिय गुरुभक्तां ॥ ८७ ॥
कली प्रबल झाला मोठा । श्रद्धेसि मारिला चपेटा ।
परि प्राचीन सुलभ वाटा । साधकें न सोडाव्या ॥ ॥ ८८ ॥
वरी दिसते मोहक । अंतरीं अति भयानक ।
साधकें नसावें वंचक । लोकेपणे कदापि ॥ ८९ ॥
परांतर दुखविणें हेंचि दुरित । दया सदाचार हेंचि सुकृत ।
रामनाम साधन सारभूत । वैराग्य परम वैभव ॥ ९० ॥
शेवटीं एक विनवणी । लय लागो नामस्मरणीं ।
श्रीजगदीश नमोनी । घेऊं गुरुचरणीं विसांवा ॥ ९१ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ९२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4/feed/ 0
श्री रामदासस्वामिकृत् करुणा स्तोत्रें https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d-%e0%a4%95%e0%a4%b0/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d-%e0%a4%95%e0%a4%b0/#respond Thu, 25 Jan 2024 06:18:24 +0000 http://www.sadguruvani.in/?p=794

॥ श्रीराम समर्थ ॥

विद्यानिधान गणराज विराजताहे । सिंधूर तो घवघवीत रसाळपाहे ।
विनांसि मार अनिवारचि होत आहे । आनंदरूप तुळणा दुसरीन साहे ॥ १ ॥
गंडस्थळे झिरपती बहु वास जेथें । सुवासमस्त रिझले अळिकूळ तेथें ।
शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा । तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा ॥ २ ॥
फर्सा पुसूनि सरसावतसे अघाला । भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला ।
साठीसहस्र गण त्यांसरिसा निघाला । मूषकवाहन करी दुरितासि हाला ॥ ३ ॥
वीतंडसा बलयंड गिरितुल्य धांवे । भक्तांसि रक्षित रिपूवरि तो उठावे ।
अंदूस तोडरगुणे करितो चपेटा । गर्जिनल्या घणघणाट प्रचंड घंटा ॥ ४ ॥
ध्यानीं धरील नरकुंजर बुद्धिदाता । त्याची फिटे अबलिळा सकढक चिंता ।
आधीं गणेश सकळांपुजणेंचि लागे । दासां मनीं तजविजा ओवजा न लागे ॥ ५ ॥

गणेशशारदासद्‌गुरु

गजवदन विराजे रंगसाहित्य माजे । रतिपतिगति लाजे लुब्ध कैळासराजे ।
फरश कमळ साजे तोडरीं बीद गाजे । सिद्धि बुद्धि अबळा जेपावती विश्वबीजें ॥ १ ॥
नटवर नटनाट्ये नाट्यनटांगसंगी । गजवदन सुरंगी रंगसाहित्यरंगी ।
अभिनव नटलीळा रंगणी रंग माजे । चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे ॥ २ ॥
हरिसुतदुहिता ते मुख्य आधीं नमावी । मग सुगमपथीं हे सीघ्र काळे गावी ।
मतिकमळ विकासे सर्व साहित्यभासे । दुरित सकळ नासे स्वस्व-रूपी विळासे ॥ ३ ॥
तुजविण मति माझी मंदली शारदांवे । लमंचग जगदंबे तूं करीं वो विलंबें ।
प्रगट रुप करावें वैखरीमाजि आतां । अगणित गुण गातां तोषवीं बुद्धिमतां ॥ ४ ॥
अगणितसुखदाता त्यासि वंदीन आतां । शुभ लिखित विधाता शीकवी धातमाता ।
गुरुवचनबळे हा साधका मोक्ष लाभे । विमळ भजनलीळा अंतरामाजि शोभे ॥ ५ ॥

विमळ विवेक

गजमुख सुखदाता मानसीं आठवावा । मग बिमळमतीचा योग पुढे करावा ।
सुरवर मुनि योगी वंदिती धुंडिराजा । सकळ सफळ विद्या यावया आत्मकाजा ॥ १ ॥
खळखळ खळयोगें बाउगी होत आहे । तळमळ मळ पोटीं सज्जनांतं न साहे ।
मळमळ करिताहे तें कदाही न रहे । परि विमळविवेकें कल्पना स्थीर राहे ॥ २ ॥
चटपट विषयांची सर्व सोडूनि द्यावी । वटवट न करावी भक्ति भावें कराबी ।
खटपट हटयोगें कामना ते नसावी । झटपट श्रवणाची सार चित्तीं वसावी ॥ ३ ॥
जपतजपत काचा मेळ त्या मातृकांचा । निगमगुज फुकाचा योग सी सुखाचा ।
सकलभुवनवासी चूकलासी तयासी । हर हर हर कासीसर्वदा तूजपासी ॥ ४ ॥

नमन

नमूं फर्शपाणी नमूं यंत्रपाणी । नमूं मोक्षपाणी नमूं चापपाणी ।
नमूं चक्रपाणी नमूं शूळपाणी । नमूं दंडपाणी हरिलूमपाणी ॥ १ ॥
नमूं आदिमाता नमूं योगमाता । नमूं वेदमाता नमूं विश्वमाता ।
नमूं भक्तिमाता नमूं मुक्तिमाता । नमूं सज्जनाची कृपा ज्ञानमाता ॥ २ ॥
नमूं योगरूपी नमूं ज्ञानरूपी । नमूं संतरूपी नमूं ध्यानरूपी ।
नमूं दिव्यरूपी नमूं निश्वरूपी । नमूं येकरूपी गुरु सस्वरूपी ॥ ३ ॥
नमूं संतयोगी नमूं सिद्धयोगी । नम भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
नमूं आत्मनिष्ठा नमूं योगनिष्ठां । नमूं सर्वश्रेष्ठां वरिष्ठां वरिष्ठां ॥ ४ ॥
मनी चिंतितां राम विश्राम वाटे । जगज्जाळजंजाळ हे सर्व तूटे ।
तुटे काळजी काळ जिंकावयाची । फुटे वृत्ति अर्थातरी जावयाची ॥ ५ ॥

गणपती मति दे मज लाघवी । जनकजापतिचा लघुसा कवी ।
विनवितों करुणाळयकारणा । परम सुंदर दे मज धारणा ॥ १ ॥
सबळ रामकथा वदतां नये । म्हणुाने वांछितसे तुझिये दये ।
विधिसुते स्वहिते करुणालये । हरिजना विजयो तुजला जये ॥ २ ॥
बहुत बाड पवाडे वदों कसे । कवित-जाडैकळा हदई नसे ।
बहुत हीण कठीण कुलक्षणु । रघुविराकरितांचि सुलक्षणु ॥ ३ ॥
बहुत सेवक त्याहुनि हीण मा । बहुत सेवक त्याहुनि दीन भी ।
बहुत काय बदों गुण आपुले । पतित ते मजहूनि भले भले ॥ ४ ॥
पतित दास जनीं तुमचे खरे । पतितपावन नाम कसें उरे ।
वचन लागतसे पाहातां धुरे । नुधरितां ब्रिद हे तुमचे नुरे ॥ ५ ॥

रघुपतितनुरंगें रंगली नीळशोभा । रघुपतिरुपयोगें सर्वलावण्यगाभा ।
रघुपतिगुणगंधे धैर्य गांभीर्य लोकीं । रघुपति मम चित्तीं बैसला येकनेकीं ॥ १ ॥
त्रैलोक्यनाथ रघुनाथ अनाथबंधू । त्रैलोक्यनाथ रघुनाथ करुणकसिंधू ।
त्रैलोक्यनाथ रघुनाथ कोदंडधारी । त्रैलोक्यनाथ रघुनाथ लीळावतारी ॥ २ ॥
रघुपतिपदयुग्मीं लीन भावे असावें । रविकुळटिळकाचें नाम वाचे वसावें ।
श्रवणमनन भावें आदरेसीं करावें । परम सुख समाधी संतसंगें तरावें ॥ ३ ॥
तुजविण सिण जाला धांव रे रामराया । कठिण दिवस जातो तापली सर्व काया ।
सकळ विकळ गात्र अवस्था लागली रे । तुजविण जगदीशा बुद्धि हे भंगली रे ॥ ४ ॥

गूज हें सज्जनाचें

वदनिं मदन इंदू तूळितांही तुळेना । अगणितगुणसिंधू बिंदु तो वर्णवेना ।
सकळ भुवन पाळी ऊपमा काय द्यावी । विकळशरिरभावे भावितां चित्त गोवी ॥ १ ॥
दशशतवदनाचा धीर मेरू बळाचा । परम कुशळ वाचा शेष सर्वोत्तमाचा ।
अगणितगुणमुद्रा शोधितां त्या नरेंद्रा । अकळ विकळभावे जाहला गुणनिद्रा ॥ २ ॥
स्मरण स्मररिपूचें वीषहर्ते वपूचें । निजबिज निगमाचे सार सर्वागमांचें ।
मन त्रिभुवनाचे गूज योगीजनाचें । जिवन जड जिवांचें नाम या राघवाचें ॥ ३ ॥
हरिजनभजनाचा होय साक्षी मनाचा । सकळत्रिभुवनाचा प्राण साधूजनांचा ।
परिहरिभजनाचा आखिलासे दिनाचा । घननिळगगनाचा रंग सर्वोत्तमाचा ॥ ४ ॥
विधिकुळभुषणाचे धाम सर्वांगुणांचें । भरण अभरणाचें सर्वलावण्य साचें ।
सुख परमसुखाचे ध्येय ब्रह्मादिकांचें । भजन हरिजनाचें गूज हें सज्जनाचें ॥ ५ ॥

शीतल छाया

रघुविरभजनाची मानसीं प्रीति लागो । रघुविरस्मरणाची अंतरीं वृत्ति जागो ।
रघुावरचरणाची वासना वास मागो । रघुविरगुण गातां वाणि हे नित्य रंगो ॥ १ ॥
चतुरपण जनी हे पाहता आडळेना । निकट रघुविराचें रूप कैसे कळेना ।
चपळमन वळेना गर्वताठा गळेना । तुजविण जगदीशा कर्मरेखा टळेना ॥ २ ॥
तरुणपण देहाचें लापता वेळ नाहीं । तनमनधन अंतीं वोसरे सर्वकाहीं ।
सकळ जन बुडाले. व्यर्थ मायाप्रवाहीं । झडकरि सुमना रे हीत शोधूनि पाही ॥ ३ ॥
पळपळ चळताहे बाळ तारुण्य देहीं । तळमळ विषयांची नेणवे हीत काहीं ।
लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे । जळजळ शितळा हे भक्तिसेउनि राहे ॥ ४ ॥
दिनकरकुळवल्ली लोटली अंगभारें । रघुविरअवतार दाटली थोरथोरें ।
सुखरूप सुखवासी राहिले योगरासी । सफळ सितळ छाया फावली रामदासी ॥ ५ ॥

श्रीरामाचे उपकार

हिणाहून मी हीण जैसे भिकारी । दिनाहून मी दीन नानाविकारी ।
पतीतासिरे आणि हातीं धरावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥ १ ॥
जनीं भक्ति नाहीं मनीं भाव नाहीं । मला युक्ति ना बुद्धि काहींच नाहीं ।
कृपाळपणे राज्य रंकासि द्यावें । समर्था तो काय उत्तीर्ण व्हावें ॥ २ ॥
बहुसाल अन्याय कोट्यानकोटी । रघूनायके घातले सर्व पोटीं ।
किती काय गूणांसि म्यां आठवावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥ ३ ॥
समर्थे दिल्हें सौख्य नानापरीचें । सदा सर्वदा जाणसी अंतरीचें ।
लळे पाळिले तूं कृपाळू स्वभावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥ ४ ॥
दिनानाथ हे ब्रीद त्वां साच केलें । ह्मणे दास भक्तांसि रे उद्धरीलें ।
मुखें सांडणे या देह्याचें करावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥ ५ ॥

प्रभु दर्शन

नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी । उदासीन जो वीतरागी विरागी ।
जनस्थानगोदातटीं वास केला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ॥ १ ॥
लिळाविग्रही देव ब्रह्मादिकांचा । सदा बोलणे चालणे सत्य वाचा ।
जया चिंतितां चंद्रमौळी निवाला । प्रभु देखिला दास संतुष्ट जाला ॥ २ ॥
दिनानाथ विख्यात हे नाम साजे । प्रजापाळकू रामराजा विराजे ।
बहू सुकृताचा बरा काळ आला । प्रभु देखिळा दास संतुष्ट जाला ॥ ३ ॥
जेणे सोडिल्या देवकोटी अचाटो । सुखें चालती स्वर्गिच्या स्वर्गवाटा ।
प्रतापेंचि त्रैलोक्य आनंदवीला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ॥ ४ ॥
ऋषी तापसी योगरासी विळासी । मनीं चिंतिती राम लावण्यरासी ।
असंभाव्य त्या कीर्तिच्या कीर्तिढाला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ॥ ५ ॥

श्रीसमर्थाची इच्छा

सीवणा मनाचा विपरीतवाणा । उदास वाटे बहुसाल प्राणा ।
मग राघवा रे तुज बाहिलों रे । कृपाळुवें सत्वर पाहिलों रे ॥ १ ॥
देवें दयाळं करुणा करावी । भक्ताभिमानें भरणी भरावी ।
। हे रामनीमी तरणी तरावी । दासां समस्तां चरणी वरावी ॥ २ ॥
रघुनाथदासा कल्याण व्हावें । अती सौख्य व्हावें आनंदवावें ।
उद्वेग नासी वर शत्रु नासो । नानाविळास मग तो विळासो ॥ ३ ॥
कोटें नको रे कळहो नको रे । कापट्य की सहसा नको रे ।
निर्वाणचिंता निरसीं अनंता । शरणागतां दे बहु धातमाता ॥ ४ ॥
अजयो न हो रे जयवंत हो रे । आपदा नको रे बहु भाग्य हो रे ।
श्रीमंतकारी जनहीतकारी । परऊपकारी हरि दास तारीं ॥ ५ ॥

श्रीसमर्थांची निष्ठा

तज वर्णितों भाट मी देवराया । सदा सर्वदा गाय ब्रीदं सवाया ।
महाराज दे आंगिचे वस्त्र आतां । बहू जीर्ण जाली देहेबुद्धिकथा ॥ १ ॥
तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा । सदा स्वस्था चिंतीतसे गा महींद्रा ।
राजाधीश देशा उरपूर्ण द्यावें । भवदैन्य हें देशधाडी करावें ॥ २ ॥
तुझा भृत्य मी भार्गादर्पजीता । जीवित्व असे अपिलें तूज आतां ।
भवा जिंकितां जीव देईन पाहे । तुज सन्मुख पाठिसी स्थीर राहे ॥ ३ ॥
रघुनायका नीकट दास तूझा । तुला वीकिलासे स्वयें देह माझा ।
सदा सर्वभावें करी दास्य तूझें । देई आपुलें वेसवेतेन माझें ॥ ४ ॥
तुझे मारुतीसारिखे दास देवा । मज मानवा किंकरा कोण केवा ।
दिनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे । तेणें मानसी थोर आनंद माजे ॥ ५ ॥

चाफळी श्रीरामाच्या आगमनाचा आनंद

लवे नेत्रपातें स्फुरे आजि बाहे । दिनानाथ हा राम येणार आहे ।
जयाचेनि योगें सुखानंद लोटे । तया देखतां अंतरीं वाष्प दाटे ॥ १ ॥
लळे पाळितो राम आम्हां दिनांचे । कृपासागरू भाव जाणे मनाचे ।
नुपेक्षी कदा संकटीं धांव घाली । तया देखतां मानसें तें निवालीं ॥ २ ॥
लगा पाहतां राघवेंवीण नाहीं । निराधार हे पाहतां सर्व कांहीं ।
चळेना जनीं तोचि आश्रो धरावा । रघुराज आधार याचा करावा ॥ ३ ॥
लपावें अती आदरें रामरूपी । भयातीत निश्चिंत ये स्वस्वरूपी ।
कदा तो जनी पाहतां ही दिसेना । सदा ऐक्य तो भिन्न भावं बसेना ॥ ४ ॥
लघूलाघवी राम कोदंडधारी । मनी चिंतितां शोक संताप हारी ।
महां संकट नाम घेतां निवारी । भवसागरी मूढ पाषाणतारी ॥ ५ ॥

श्रीरामाचे ब्रीद

चकोरासि चंद्रोदयीं सूख जैसे । रघुनायका देखता सूख तैसें ।
सगूणासि लांचावलें स्थीर राहे । रघुनंदनेंवीण कांहीं न पाहे ॥ १ ॥
चळेना समरंगणी ठाण मागें । चळेना मुखें बोलतां वाक्य यूगें ।
चळेना कृपासिंधु कल्पांतकाळीं । रघुराज हा आदरें दास पाळी ॥ २ ॥
चमत्कारले चित्त हे रामगूणीं । उठे कीर्ति वाखाणितां प्रीति दूणी ।
रघूनायकासारिखा देव नाहीं । क्रिया पाहतां चोखडी सर्व काहीं ॥ ३ ॥
चळेना कदा राज्य बीभीषणाचें । चळेना देहे चालतां मारुतीचें ।
चळेना तगी राहतां नामछंदीं । चळेना सिमा घातली सेतीं ॥ ४ ॥
चपेटा विझे काळमाथां जयाचा । धरीं रे मना पंथ या राघवाचा ।
विवेकी जनें राजपंथें चि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ ५ ॥

रामरूप

परमसुंदर रूपश्यामळ । इंद्रनीळकिळकांति कोमळ ।
भयनिवारण भक्तवत्सळ । चरपराक्रम कीर्तिवीमळ ॥ १ ॥
भुवनकंटकदैत्यमारक । अमरमोचन दैन्यहारक ।
दुरितनाशन पुण्यकारक । हरितसंकट दासतारक ॥ २ ॥
विकटविषमताळछेदक । बरअनावदैत्यभेदक ।
वशमुखांतकसीरच्छेदक । ऋषिमुनीजनचित्तवेधक ॥ ३ ॥
अमरभूषण उत्तमोत्तम । भुवनपाळक हा रघूत्तम ।
। विरवीरांतक हा वीरोत्तम । असुर अंतक हा वरोत्तम ॥ ४ ॥
बहुतपीडकदैत्यभंजन । ऋषिमुनीजनयोगिरंजन ।
दुरितदानवदुष्टभंजन । अतुळकीर्तन व्यस्तव्यंजन ॥ ५ ॥

परशुरामाची प्रार्थना

महांकोप अग्नी ऋसी जामदग्नी । समर्था तया जाणिजे सर्वसूज्ञी ।
सदा सर्वदा घेतसे नाम तुझें । वरिष्ठा स्वभावेंचि हे गोत्र माझें ॥ १ ॥
वसे सागराचे तिरी सूत तूझा । समाचार तो घेत नाहींच माझा ।
तयाला बहुतांपरी शीकवावें । स्वभावेंचि वाढेल ऐसें करावें ॥ २ ॥
किती येक मागे बहू युद्ध केलें । कितीवेळ या ब्राह्मणा राज्य दिल्हें ।
अकस्मात सामर्थ्य तें काय जालें । युगासारिखें काय नेणों विझालें ॥ ३ ॥
चिरंजीव आहेसि ऐसी वदंती । समर्था ! तुझें चित्तकाठिण्य कीती ।
तुझें नामधारी तुला हे कळेना । कृपाळूपणे चित्त कैसे बळेना ॥ ४ ॥
नको रे उदासीन हे वाक्य मानी । समर्था असावें बहू साभिमानी ।
करावी दिनानाथ हे सत्य वाचा । तुला चिंतितों दास मी राघवाचा ॥ ५ ॥

उदासीन हा काळ कोठे न कंठे

समाधान साधुजनाचेनि योगें । परी मागुतें दुःख होतें वियोगें ।
घडीने घडी शीण अत्यंत वाटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ १ ॥
घरें सुंदरें सौख्य नाना परीचें । परी कोण जाणेल तें अंतरीचें ।
मनी आठवीतांचि तो कंठ दाटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥ २ ॥
बळें लावितां चित्त कोठें जडेना । समाधान तें कांहि केल्या घडेना ।
नव्हे धीर नैनीं सदा नीर लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ३ ॥
अवस्था मनी लागली काय सांगों । गुणी गंतला हेत कोण्हासि मागों ।
बहुसाल भेटावया प्राण फूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ४ ॥
कपाळपणे भेट रे रामराया । वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया ।
जनामाजि लौकीक हा ही न सूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ५ ॥
अहा रे विधी ! त्वां असें काय केलें । पराधेनता पाप माझें उदेलें ।
बहुतांमधे चूकतां तूक तूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ६ ॥
समर्था मनीं सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी ।
घडेना तुझा योग हाँ प्राप्त खोटें । उदासीन हाँ काळ कोठे न कंठे ॥ ७ ॥
अखंडीत हे सांग सेवा घडावी । न होतां तुझी भेटि काया पडावी ।
दिसंदीस आयुष्य हे व्यर्थ आटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ८ ॥
भजों काय सर्वोपरी हीण देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा ।
म्हणों काय मी कर्मरेखा न लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ९ ॥
म्हणे दास मी वास पाहें दयाळा । रघुनायका भक्तपाळा भुपाळा ।
पहावें तुला हे जिवीं आर्त मोठे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ १० ॥

तुजवीण रामा मज कंठवेना

तुझिया वियोगें जीवित्व आलें । शरीरंपांगें बहु दुःख जालें ।
अज्ञान दारिद्य माझें सरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १ ॥
परतंत्र जीणें कंहूं किती रे । उच्चाट माझे मनीं वाटतो रे ।
ललाटरेखा तरि पालटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ २ ॥
जडली उपाधी अभिमान साधी । विवेक नाहीं बहुसाल बाधी ।
स्वामी बियोगें पळही गमेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३ ॥
विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमानें पडिलों प्रबाहीं ।
स्वहीत माझें होतां दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ४ ॥
विषयी जनानं मज लाजवीलें । प्रपंचसंगें आयुष्य गेलें ।
समयीं बहुकोध शांती घडेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ५ ॥
सदृढ जाली देहेबुद्धि देहीं । वैराग्य काही होणार नाहीं ।
अपूर्ण कामीं मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ६ ॥
निरूपणी हे सदवृत्ति होते । स्थळत्याग होतां सवेंचि जाते ।
काये करूं रे किया घडेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ७ ॥
संसारसंगें बह पीडलों रे । कारुण्यसिंधु मज सोडवीं रे ।
कृपाकटाक्षे सांभाळी दीना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ८ ॥
जय जय दयाळा त्रैलोक्य पाळा । भवसिंधुहारी मज तारि हेळा ।
स्वामी वियोंगे पळही गमेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ९ ॥
आम्हां अनाथां तूं एक दाता । संसारचिंता चुकवीं समर्था ।
दासा मनीं आठव वीसरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥

रघुनायका मागणे हेचि आता

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेवा करावी ।
सदा प्रीति लागो तुझे गूण गातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ १ ॥
तुझें रूपडे लोचनीं म्यां पहावें । तुझे गुण गातां मनासी रहावें ।
उठो आवडी भक्तिपंथेंचि जातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ २ ॥
मनी वासना भक्ति तुझी करावी । कृपाळूपणे राघवें पूरबावी ।
वसावें मज अंतरीं नाम घेतां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ३ ॥
सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।
नुपेक्षीं मज गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेचि आतां ॥ ४ ॥
नको द्रव्यदारा नको येरझारा । नको मानसी ज्ञानगवे फुगारा ।
सगुणी मज लावि रे भक्तिपंथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ५ ॥
भवें व्यापलों प्रीतिछाया करावी । कृपासागरें सर्वचिता हराबी ।
मज संकटीं सोडवावें समर्था । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ६ ॥
मनी कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसाबी ।
नकी संशयो तोडिं संसारव्यथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ७ ॥
समर्थापुढे काय मागों कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना ।
पुढे संशयो नीरसी सर्व चिंता । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ८ ॥
बिदाकारणें दीम हातीं धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावें ।
सुटो ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां । रघुनायका मागणें हेंचि आता ॥ ९ ॥

रामपंचायतन

देवालये परम सुंदर दीपमाळा । वृंदावनें रमणिय बरधर्मशाळा ।
राजांगणे समघनें भुमिका सुढाळा । पुंजाळ ते झळकती बहु रत्न माळा ॥ १ ॥
सुवर्णवर्ण बहुवर्ण किरणें अपारें । मिश्रीत ते तळपती घन थोरथोरें ।
उंचावले गगन त्याहुनि उंच भासे । मुक्ताफळी जडित मंडप तो विळासे ॥ २ ॥
सिंहासनावरि रघूत्तस मध्यभागीं । बंधू तिघे परम सुंदर पृष्ठभागीं ।
वन्हीसुता निकट शोभत वाममार्गी । वीलासतो भिम भयानक पूर्वभागीं ॥ ३ ॥
मार्तडमंडप उर्दडचि सौख्यकारी । त्रैलोक्यपावन प्रभू दुरितें निवारी ।
ध्यातो सदाशिव अखंडित चापपाणी । ऊदंड कीर्ति निगमी महिमा पुराणीं ॥ ४ ॥
आनंदकंद रघुनंदन शाभताहे । कंवर्पकोटि वदनीं उपमा न साहे ।
आकर्ण पूर्णनयनीं रमणीय शोभा । विस्तीर्ण कीर्ण भुषणी जगदीश उभा ॥ ५ ॥

रविकुळटिळक

रविकुळटिळकाचे रूपलावण्य पाहे । रविकुळटिळकाचे चिंतनी चित्त रहे ।
रविकुळटिळकाची कीर्ति जीवीं भरावी । रविकुळटिळकाची मूर्ति ध्यानीं धरावी ॥ १ ॥
कमळनयनराम वेधिले पूर्णकामें । सकळभयविरामं राम विश्रामधाम ।
घननिळतनुश्यामें चित्ततोर्षे आरामें । भुवनभजनने में तारिले दास रामें ॥ २ ॥
बहुविध भजनाची वैवतें पाहिली हो । सकळ त्यजुनि रामी वृत्ति हेराहिली हो ।
विमळगुणशिळाची लागली प्रीति मोठी । बिमळ हृदय होतां उद्धरे कूळकोटी ॥ ३ ॥
विमळगुणशिळाचे आदरें गण गावे । विमळगुणशिळाचे दास वाचे वदावे ।
विमळगुणशिळाचा अंतरीं वेध लागो । विमळगुणशिळाचा रंगणीं रंग गाजो ॥ ४ ॥
सकळगुणनिधीचा राम लावण्यसिंधू । अगणित गणवेना शक्तिरूपें अगाधू ।
प्रबळ बळ चळेना वाउगें व्यर्थ कामीं । झणउनि मन रामी लागले पूणेकामीं ॥ ५ ॥
परमसुखनदीचा मानसीं पूर लोटे । घननिळतनु जेव्हां अंतरी राम भेटे ।
सुख परमसुखाचे सर्व लावण्य साचें । स्वरुप जगदिशाचें ध्यान त्या ईश्वराचें ॥ ६ ॥
मधुकर मन माझें रामपादांबुजी हो । सगुण गुण निजांगें नित्य रंगोनि राहो ।
अचपळ गुणगुणी बैसली प्रीति दूणी । शरणचरणभावें जाहला राम ऋणी ॥ ७ ॥
रघुपति गुणरंगें पाविजे भक्तिसंगें । भजन जनतरंगें सर्व सांडुनि मागें ।
अनुदिन वितरागें योगयागं विरागें । प्रगट तरत संगें सर्वदासानुरागें ॥ ८ ॥
रघुवरपर आतां कीर्तनीं गूण गावे । मथन त्रिभुवनाचे सर्व साहित्य फावे ।
सकळ जन तरावे वंश ही उद्धरावे । स्वजन जन करावें रामरूपी भरावें ॥ ९ ॥
सकळ भुवन तारी राम लीळावतारी । भवभय अपहारी राम कोदंडधारी ।
मनन करि मना रे धीर हे वासना रे । रघुविरभजनाची हे धरीं कामना रे ॥ १० ॥

अनुदिन अनुतापें तापलों

अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ।
अचपळ मन माझे नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धाव रे धांव आतां ॥ १ ॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला ।
रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कास तूझी धरावी ॥ २ ॥
विषपजनित सूखें सौख्य होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व काहीं ।
रविकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें स्वस्वरूपी भरावें ॥ ३ ॥
तनु मनु धनु माझें राघवा रूप तुझें । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ।
प्रचळित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचळभजनलीळा लागली आस तुझी ॥ ४ ॥
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना ।
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणउनि करुणा हे बोलतों दीनवाचा ॥ ५ ॥
जळत हवय माझें जन्म कोट्यानकोटी । मजवारे करुणेचा राघवा पूर लोर्टी ।
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधु । षडरिपुकुळ माझे तोडि याचा विरोधु ॥ ६ ॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । सिणत सिणत पोटी पाहिली वास तुझी ।
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे । तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥ ७ ॥
सबळ जनक माझा राम लावण्यपेटी । म्हणउनि मज पोटी लागली आस मोठी ।
दिवस गणित बोटीं प्राण ठेऊनि कंठीं । अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥
जननिजनकमाया लेकरूं काय जाणे । पय न लगत मूर्ख हाणतां वत्स नेणे ।
जळधरकणआशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥
तुजविण मज तैसें जाहलें देवराया । विलग विषमकाळी तूटली सर्व माया ।
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं । वमकवमन जैसें त्यागिले सर्व काहीं ॥ १० ॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ।
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि देती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे । जिवलग मग कैचें चालतें हेंचि साचें ।
विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥
सुख सुख म्हणतां हें दुःख ठाकूनि आलें । भजन सकळ गेले चित्त दुञ्चित्त जालें ।
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना । परम कठिण देहीं देहबुद्धी वळेना ॥ १३ ॥
उपरति मज रामी जाहली पूर्णकामी । सकळभ्रमविरामी राम विश्रामधामी ।
घडिघडि मन आतां रामरूपी भरावें । रविकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥
जळचर जळवासी नेणती त्या जबासी । निशिदिन तुजपासीं चूकलों गुणरासी ।
भुमिधरनिगमांसी वर्णवेना जयासी । सकळभुवनवासी भेटि हे रामदासीं ॥ १५ ॥

झडकरि मज रामा सोडवी

वरुण बदन वापीमाजि जिव्हास्वरूपी । मुख वसत तदापी वैखरी कोकिळापी ।
मधुर मधुर कुंजे नाम या राघवाचें । निववी वसत संती श्रोतयां सज्जनाचें ॥ १ ॥
ममवदनसरोजी षटपदें शारदांबे । रघुपतिगुण रुंझे तूं न गुंते विलंब ।
तंववरि करि लाहो प्राण जै अर्क आहे । प्रचलित समयीं आकर्षणं स्थीर राहे ॥ २ ॥
वणवण विषयांची सर्वथा ही शमेना । अनुदिन मोहमाया लागली हे तुटेना ।
झडकरि मज रामा सोडवीं पूर्णकामा । तुजविण गुणधामा कोण रक्षील आम्हां ॥ ३ ॥
विषयविष वमा कल्पनेला दमावें । निजपद निजभावें दृढ चित्तीं धरावें ।
भवभय निरसावें साधुसंगी वसावें । सगुणभजन द्यावें स्वामि देवाधिदेवें ॥ ४ ॥
विगळित मन माझं तूं करीं देवराया । हरिभजन कराया पाहिजे दृढ काया ।
निरुपण विवराया तर्कपंथेचि जाया । रघुपतिगुणछाया चित्त माझं निवाया ॥ ५ ॥

नाथलोकत्रयाचा

हरि हरि दुरित तो स्वामि वैकुंठराजा । सुरवर नर पाळीं शोभती चारी भूजा ।
झळफटित किळा हे हेमरत्नांबरांचा । परम कुशळ शोभे नाथ लोकत्रयाचा ॥ १ ॥
शमशम विषयांची काहि केल्यां शमेना । अचपळ मन माझं साजणी हे दमेना ।
अनुदिन मज पोटीं दुःख तेही बमेना । तुजविण जगदीशा वेळ तोही गमेना ॥ २ ॥
विषम गति मनाची ते मला आवरेना । शरिर विकळ कामें तें कदा सांवरेना ।
सुख दुःख मज माझं वाढिलें तंचि जेऊं । रघुपति ! तुजला रे कासया बोल ठेऊ ॥ ३ ॥
नवस हरिकथेचे राम भक्ती करावे । कठिण विषम काटी मम जीवीं धराव ।
विविध सकळ कांहीं दोष नासोनि जाती । रघुविरभजन हो कामना पूर्ण होती ॥ ४ ॥

तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला

असंख्यात रे भक्त होऊनि गेल । तिहीं साधनांचे बहू कष्ट केले ।
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों॥ १ ॥
बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरीं भेटि नाहीं जनांसी ।
स्थिती ऐकतां थोर विस्मीत जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥ २ ॥
सदा प्रेमरासी तयां भेटलासी । तुझ्या दर्शनं स्पर्शने सौख्यराशी ।
अहंतामनी शब्दज्ञाने बुडालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ ३ ॥
तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आलो । असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ।
बहु धारणा थोर चक्कीत जाला । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥ ४ ॥
बहूसाल देवालय हाटकाची । रसाळा कळा लाघवें नाटकाचीं ।
पुजा देखतां जाड जीवीं गळाला । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ ५ ॥
कितेकी देहे त्यागिले तूजलागीं । पुढें जाहले संगतीचे विभागी ।
। देहेदुःख होतांचि वेगीं पळालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला ॥ ६ ॥
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती ।
परस्तावलों कावलों तप्त जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला ॥ ७ ॥
सदासर्वदा राम सोडोनि कामीं । समर्था तुझं दास आम्ही निकामी ।
बहु स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ ८ ॥

श्रीरामावर भार

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांहीं । नसे प्रेम हे राम विश्राम नाहीं ।
असा दीन अज्ञान मी दास तुझा । समर्था जनी घेतला भार माझा ॥ १ ॥
रघुनायका जन्मजन्मांतरांचा । अहंभाव छदानि टाकी दिनाचा ।
जनीं बोलती दास या राघवाचा । परी अंतरी लश नाहीं तयाचा ॥ २ ॥
दिनाचे उणं दीसता लाज कोणा । जगीं दास दास तुझा दन्यवाणा ।
शिरी स्वामि तूं राम पूर्णप्रतापी । तुझा दास पाहीं सदा शीघ्र कोपी ॥ ३ ॥
रघुनायका दीन हातीं धरावें । अहंभाव छेदोनियां उद्धरावें ।
अग्रणी तयालागि गूणी करावें । समर्थे भवसागरी ऊतरावें ॥ ४ ॥
किती भार घालू रघूनायकाला । मजकारणे शीण होतील त्याला ।
दिनानाथ हा संकटीं धाव घाली । तयाचेचि हे सर्व काया निवाली ॥ ५ ॥
मला कॉबसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे फीटली सर्व चिंता ।
समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें । सदासर्वदा नाम वाचे वदावें ॥ ६ ॥

बुद्धि दे रघुनायका

युक्ति नाही बुद्धि नाहीं । विद्या नाहीं विवेकिता ।
नेणता भक्त मी तुझा । बुद्धि दे रघुनायका ॥ १ ॥
मन हे आवरेना की । बासना वावडे सदा ।
कल्पना धावते सैरा । बुद्धि दे रघुनायका ॥ २ ॥
अन्न नाहीं वस्त्र नाहीं । सौख्य नाहीं जनांमध्ये ।
आश्रयो पाहतां नाहीं । बुद्धि दे रघुनायका ॥ ३ ॥
बोलतां चालतां येना । कार्यभाग कळेचिना ।
बहू मी पीडलों लोकीं । बुद्धि दे रघुनायका ॥ ४ ॥
तुझा मी टोणपा जालों । कष्टलों बहुतांपरी ।
सौख्य ते पाहतां नाहीं । बुद्धि दे रघुनायका ॥ ५ ॥
नेटकें लिहिता येना । वाचितां चुकती सदा ।
अर्थ तो सांगतां येना । बुद्धि दे रघुनायका ॥ ६ ॥
प्रसंग वेळ तर्कना । सुचेना दीर्घ सूचना ।
मैत्रिकी राखितां येना । बुद्धि दे रघुनायका ॥ ७ ॥
कळेना स्फूर्ति होईना । आपदा लागली बहू ।
प्रत्यहीं पोट सोडीना । बुद्धि दे रघुनायका ॥ ८ ॥
संसार नेटका नाहीं । उद्वेगो वाटतो जिवीं ।
परमाथू कळेना की । बुद्धि दे रघुनायका ॥ ९ ॥
देईना पुरविना कोणी । उगेचि जन हांसती ।
विसरु पडेना पोटीं । बुद्धि दे रघुनायका ॥ १० ॥
पिशुने वाटती सर्वै । कोणीही मजला नसे ।
समर्था तूं दयासिंधू । बुद्धि दे रघुनायका ॥ ११ ॥
उदास वाटतें जीवीं । आतां जावें कुणीकडे ।
तूं भक्तवत्सला रामा । बुद्धि दे रघुनायका ॥ १२ ॥
काया वाचा मनोभावें । तुझा मी म्हणवीतसे ।
हे लाज तुजला माझी । बुद्धि दे रघुनायका ॥ १३ ॥
सोडवील्या देव कोटी । भूभार फेडिला बळें ।
भक्तांसि आश्रयो मोठा । बुद्धि दे रघुनायका ॥ १४ ॥
भक्त उदंड तुम्हांला । आम्हाला कोण पूसते ।
ब्रीद हे राखणे आधीं । बुद्धि दे रघुनायका ॥ १५ ॥
आशा हे लागली मोठी । दयाळू वा दया करीं ।
आणखी नलगे काहीं । बुद्धि दे रघुनायका ॥ १६ ॥
उदंड ऐकिली कीर्ति । पतीतपावना प्रभो ।
मी एक रंक दुर्बुद्धी । बुद्धि दे रघुनायका ॥ १७ ॥
रामदास म्हणे माझा । संसार तुज लागला ।
संशयो लागतो पोटीं । बुद्धि दे रघुनायका ॥ १८ ॥

रघूनायका काय कैसे करावें

उदासीन हा काळ जातो गमेना । सदा सर्वदा थोर चिंता शमेना ।
उठे मानसीं सर्व सोडोनि जावें । रघूनायका काय कैसे करावें ॥ १ ॥
जनीं बोलता बोलतां वीट बाटे । नसे अंतरीं सूख कोठे न कंठे ।
घडीने घडी चित्त कीती धरावें । रघुनायका काय कैसे करावें ॥ २ ॥
बहू पाहता अंतरी कोंड होतो । शरीरास तो हेत सांडोनि जातो ।
उपाधीस देखोनि वाटे सरावें । रघूनायका काय कैसें करावें ॥ ३ ॥
अवस्था मनीं होय नानापरीची । किती काय सांगूं गती अंतरींची ।
विवेकेंचि या मानसा आवरावें । रघुनायका काय कैसें करावें ॥ ४ ॥
म्हणे दास ऊदास जालों दयाळा । जनीं व्यर्थ संसार हा वायचाळा ।
तुझा मी तुला पूसतों प्रेमभावें । रघुनायका काय कैसें करावें ॥ ५ ॥

सर्वोत्तमा के मज भेटि देसी

दुःखानळें मी संतप्त देहीं । तुजवीण रामा विश्रांति नाहीं ।
आधार तुझा मज मी विदेसी । सर्वोत्तमा के मज भेटि देसी ॥ १ ॥
प्रारब्ध खोटें अभिमान आला । स्वामीसमर्था वियोग जाला ।
तेणें बहु क्षीति वाटे मनासी । सर्वोत्तमा के मज भेटि देसी ॥ २ ॥
तुझिया वियोगें बहु वेदना रे । विवेक नाहीं आम्हां दिनारे ।
पडिला समंधु या दुर्जनसीं । सर्वोत्तमा कै मज भेटि देसी ॥ ३ ॥
संसारचिंता मज वाटते रे । रामा प्रपची मन जातसे रे ।
संसर्ग आहे इतरां जनासीं । सर्वोत्तमा के मज भेटि देसी ॥ ४ ॥

उदासीन हे वृत्ति कोठे न लागे

रघुनायेकावीण हा शीण आहे । सदा सर्वदा रंग वोरंगताहे ।
निशिदीन या राघवाच्या बियोगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ १ ॥
गुणी गुंतलें चित्त हे आवरेना । तयावीण आणीक कांहीं स्मरेना ।
समाधान हे होय त्याचंनि संगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ २ ॥
मनी प्रीति हे लागली राघवाची । सदानंद हे राम मूर्ती सुखाची ।
पदार्थी बळें लावितां चित्त भंगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ ३ ॥
मनीं आठवीतां समाधान वाटे । तया देखतां संशयो सर्व तूटे ।
न लिंपे कदा चित्त दुश्चित भंगे । उदासीन हे वृत्ति कोठें न लागे ॥ ४ ॥
मनीं तुंत अनंत या राघवाचा । तट किंत तो नाबडे या भवाचा ।
सदा सर्वदा अंतरी राम जागे । उदासीन हे वृत्ति कोठं न लागे ॥ ५ ॥
मनी नावडे द्रव्य दारा पसारा । मनीं नाबडे मायिकांचा उबारा ।
मनी नावडे भोग हा राजयोगें । उदासीन हे वृत्ति कोठं न लागे ॥ ६ ॥
जनी पाहतां भवबुद्धी अनेका । मदमत्सर निदिती येकमेकां ।
घडे त्याग याकारणं लागवेगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ ७ ॥
बहुसाल हे बोलणें आवडेना । जनीं वासना शब्दज्ञाने पडेना ।
क्रियेवीण ते बोलतां चित्त भंगे । उदासीन हे वृत्तिं कोठे न लागे ॥ ८ ॥
मनीं सर्वथा सत्य तें सांडवेना । मनीं सर्वथा मिथ्य ते मांडवेना ।
समाधान ते योगसंग निसंगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ ९ ॥
जनासारिखें बोलणें ही घडेना । म्हणोनी जनीं सर्वथा ही पडेना ।
अहंतागुणें बुद्धि वीवाद लागे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ १० ॥
उपाधीगु्णें सत्य तं मिथ्य हात । उपाधीगुण मिथ्य तें सत्य होते ।
उपाधीगुणें येक रंगे विरंग । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ ११ ॥
उपाधीगुणें लागतो पक्ष घेणें । उपाधीगुण सत्य सोडून देणं ।
उपाधीगुणें वीषयीं जीव रंगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ १२ ॥
उपाधीगुणें सर्व सोसीत जावें । उपाधीगणे मानाधन व्हावें ।
उपाधीगुणें बेर्थ हा स्वार्थ लागे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ १३ ॥
मनी सांडितां संगव्याधी उपाधी । पुढे सांपडे राम कारुण्यनीधी ।
विवेके मनींचा अहंभाव भंगे । उदासीन हे वृत्ति कोठें न लागे ॥ १४ ॥
पराधीनता राम-दासी घडेना । देहे चालतां रामभक्ति उडेना ।
उभा राम सांभाळितो पृष्ठभागें । उदासीन हे वृत्ति को न लागे ॥ १५ ॥

श्रीरामराम हे म्हणा

सुरेंद्र चंद्रशेखरु । अखंड ध्यातसे हरु ।
जनांसि सांगतो खुणा । श्री राम राम हे म्हणा ॥ १ ॥
महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती ।
सलाभ होतसे दुणा । श्री राम राम हे म्हणा ॥ २ ॥
विर्षे बहूत जाळिलें । विशेष अंग पोळलं ।
प्रचीत माझिया मना । श्री राम राम हे म्हणा ॥ ३ ॥
विशाळ व्याळं व्यस्त की । नदी खळाळ मस्तकीं ।
ऋषीभविष्यकारणा । श्री राम राम हे म्हणा ॥ ४ ॥
बहुत प्रेत्न पाहिलं । परंतु सर्व राहिल ।
विबूधपक्षरक्षणा । श्री राम राम हे म्हणा ॥ ५ ॥
अपाय होत चूकला । उपाय हा भला भला ।
नसे जयासि तूटणा । श्री राम राम हें म्हणा ॥ ६ ॥
विरांमधे विरोत्तमु । विशेष हा रघूत्तमु ।
सकाम काळ आंकणी । श्री राम राम हे म्हणा ॥ ७ ॥
बहूत पाहिलें खरें । परंतु दोनि आक्षरें ।
चुकेल यमयातना । श्री राम राम हे म्हणा ॥ ८ ॥
मनी धरुनि साक्ष । अखंड नाम हे जप ।
मनांतरी क्षणक्षणा । श्री राम राम हें म्हणा ॥ ९ ॥
देहे धरूनि वार्नरी । अखंड दास्य मी करीं ।
विमुक्त राज्य रावणा । श्री राम राम हें म्हणा ॥ १० ॥

रामभक्ताची योग्यता

श्रीराम भक्तमूळ रे । प्रसन्न सानुकूळ रे ।
समर्थ तो तयागुणें । समस्त होय ठेंगणें ॥ १ ॥
प्रपंच संचितां हरी । विसंचितां बरोबरीं ।
दयाळ तो परोपरी । विशाळ सेवकां करी ॥ २ ॥
समस्त ही पदें पदें । प्रभूपदेंचि वीशदें ।
विचार सार जोडला । सदृश्यभास मोडला ॥ ३ ॥
सदूपरी विवंचना । विचार आणितां मना ।
मनास ठाव नाडळे । विशेष हेतही गळे ॥ ४ ॥
विवेक हा भला भला । उदंड राम दाखला ।
पदी अनन्य मीळणी । उरी नसे दुजेपणी ॥ ५ ॥
विचार सार सारसा । करील कोण फारसा ।
बळेबळेचि नीवळे । कळे कळेचि आकळे ॥ ६ ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d-%e0%a4%95%e0%a4%b0/feed/ 0
अध्याय 21 ते 40 https://www.sadguruvani.in/%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af-21-%e0%a4%a4%e0%a5%87-40/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af-21-%e0%a4%a4%e0%a5%87-40/#respond Thu, 25 Jan 2024 04:55:49 +0000 http://www.sadguruvani.in/?p=743

॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीरामविजय ॥

॥ अध्याय एकविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
क्षीराब्धितटीं बैसला सर्वकाळ ॥ त्यासी क्षुधा कासया बाधील ॥
दीपाची चिंता कां लागेल ॥ दिनमणि समीप असतां पैं ॥१॥
राहतां कल्पतरुतळीं ॥ कां डंखील कामनाव्याळी ॥
गंगाजळीं शेज केली ॥ त्यासी वणवा करील काय ॥२॥
वारणाविदारकाचे संगतीं ॥ जो बैसला अहोरात्रीं ॥
त्यासी जंबूक बाधा करिती ॥ हें कल्पांतींही घडेना ॥३॥
जो नित्य करी सुधारसपान ॥ त्यासी विष बाधील काय दारुण ॥
स्वरूपीं जो सदा सावधान ॥ दुष्कृतें कैंचीं त्यापाशीं ॥४॥
कामधेनु घरीं असतां ॥ कल्पना न बाधी तत्वतां ॥
हुताशन तेज धडकतां ॥ शीत कैंचें उरेल ॥५॥
तैसी रघुवीरकृपा ज्यासी पूर्ण ॥ त्यासी न बाधी विषयहुताशन ॥
रामचरित्रीं गुंतलें मन ॥ इतर श्रवण नावडे तया ॥६॥
असो विसावा अध्याय संपतां तेथें ॥ आसाळी विदारिली हनुमंतें ॥
यावरी इंद्रजितासी लंकानाथें ॥ आज्ञा केली सत्वर ॥७॥
तों नग्न कुमारी शिंके पाठीसी ॥ रावण शकुन पुसे ब्रह्मयासी ॥
विधी म्हणे दोघांतून एकासी ॥ अपयश येईल दिसतसे ॥८॥
रावण पाहे क्रोधायुक्त ॥ विधी म्हणे वानर होईल हस्तगत ॥
तैसाचि चालला इंद्रजित ॥ अशोकवना ते वेळे ॥९॥
सवें घेऊनि चतुरंग सेना ॥ शक्रारि निघाला अशोकवना ॥
शयशीं अयुतें गज जाणा ॥ रथतुरंगमां गणना नाहीं ॥१०॥
देव बैसोनी विमानीं ॥ कौतुक पाहती तेच क्षणीं ॥
अशोकवनांत रावणी ॥ निजभारेंसी पातला ॥११॥
तों पाठमोरा हनुमंत ॥ बैसलासे फळें झेलित ॥
असुर गर्जती बहुत ॥ परी तो तिकडे न पाहे ॥१२॥
क्षणक्षणां पाठी कुरवाळित ॥ मागें परतोन वांकुल्या दावित ॥
राक्षस शस्त्रें असंख्यात ॥ वर्षते जाहले कपीवरी ॥१३॥
इंद्रजितें शर टाकिले ॥ हनुमंतें वरचेवर झेलिले ॥
मुष्टीमाजी जमा केले ॥ बहुसाल तेधवां ॥१४॥
अकस्मात पुच्छ सोडिलें ॥ रावणाचे धनुष्य हरिलें ॥
हनुमंतें आकर्ण ओढिलें ॥ बाण लावून ते समयीं ॥१५॥
अचुक मारुतीचें संधान ॥ सोडिता जाहला असंख्यात बाण ॥
जैसे शब्दामागें शब्द पूर्ण ॥ मुखांतून निघती पैं ॥१६॥
तों विमानरूढ सुधापानी ॥ पुष्पें वर्षती क्षणक्षणीं ॥
म्हणती मारुति धन्य अंजनी ॥ तुजचि एक प्रसवली ॥१७॥
राक्षसांची शिरें ते काळीं ॥ हनुमंतें असंभाव्य उडविलीं ॥
रावणीचा मुकुट तळीं ॥ छेदोनियां पाडिला ॥१८॥
बाण सरले तये वेळां ॥ सवेंच घेतली लोहार्गळा ॥
वायुवेगें धांविन्नला ॥ शक्रारीचे रथापाशीं ॥१९॥
अर्गळा घालोनि ते वेळां ॥ अश्वांसहित रथ भंगिला ॥
इंद्रजित विरथ जाहला ॥ घाबरला पहातसे ॥२०॥
लोहार्गळेचे घाय सबळ ॥ झोडिलें इंद्रजिताचें दळ ॥
वाहती रक्ताचे खळाळ ॥ समुद्रा जाती भेटावया ॥२१॥
जैसें अलातचक्र फिरे ॥ तैसा हनुमंत असुरांत वावरे ॥
रावणीस अर्गळाप्रहारें ॥ झोडिता जाहला तेधवां ॥२२॥
रावणात्मजें ते अवसरीं ॥ पाश टाकिला हनुमंतावरी ॥
तों मारुति होय मोहरी ॥ उडोनि जाय एकीकडे ॥२३॥
मागुती लहान पाश करून ॥ कपीवरी टाकी आणून ॥
पर्वतकार सीताशोकहरण ॥ होऊन पाश तोडितसे ॥२४॥
शस्त्रास्त्रें बहुसाल ॥ टाकितां नाटोपि कपि सबळ ॥
यावरी अंजनीचा बाळ ॥ इंद्रजितावरी लोटला ॥२५॥
मल्लयुद्धासी प्रवर्तला ॥ इंद्रजित बळें आपटिला ॥
नग्न करून भिकाविला ॥ चरणीं धरून हनुमंतें ॥२६॥
इंद्रजित तेव्हां रडत ॥ म्हणे मज आला काय मृत्य ॥
दळही संहारिलें समस्त ॥ न दिसे येथें कोणीही ॥२७॥
म्हणे मज निराहारियाचे हातें मरण ॥ हा तों करी फळभक्षण ॥
परी रामापाशीं नेईल धरून ॥ विटंबील नाना परी ॥२८॥
सुटे जों जनकनंदिनी ॥ तों मज घालील बंदिखानीं ॥
जैसें रावणासी धरूनि ॥ पांच पाट काढिले ॥२९॥
मग नग्न इंद्रजित पळाला ॥ विवरामाजी तो दडाला ॥
कपीनें द्वारीं पाषाण लाविला ॥ विवरीं कोंडिला राक्षस ॥३०॥
इंद्रजित कासावीस होये ॥ म्हणे कां मरण मज नये ॥
शस्त्र जवळी नाहीं करूं काय ॥ प्राणत्याग करावा ॥३१॥
विवरीं कोंडिला इंद्रजित ॥ हें दशकंठासी जाहलें श्रुत ॥
परम जाहला भयभीत ॥ विनवीतसे विरंचीतें ॥३२॥
म्हणे तुझे वचन साचार ॥ हस्तगत नव्हे कां वानर ॥
तरी तुवां जाऊनि सत्वर ॥ धरून कपि देईं आम्हां ॥३३॥
तरी तूं तेथवरी जाऊन ॥ मज द्यावें पुत्रदान ॥
काळरूप तो वानर जाण ॥ तुजविण कोणा नाटोपे ॥३४॥
मग कमलोद्‌भव पातला तेथ ॥ तंव तो नग्नचि इंद्रजित ॥
दडला असे विवरांत ॥ भयभीत मुसमुसी ॥३५॥
मग रावणी बोले करुणा वचन ॥ आतां मज सोडवीं येथून ॥
त्या वानरासी धरिल्याविण ॥ मी विवराबाहेर न येंचि ॥३६॥
कमळासन म्हणे ते अवसरीं ॥ आतां निघें विवराबाहेरी ॥
ब्रह्मपाश घालोनि झडकरी ॥ कपिबळिया धरावा ॥३७॥
रावणी देत प्रत्युत्तर ॥ ब्रह्मपाशास नावरे वानर ॥
विरिंचि म्हणे तूं अपवित्र ॥ तुज अस्त्र हें न चाले ॥३८॥
मग विष्णुसुतें ते वेळीं ॥ राघवप्रियाची स्तुति केली ॥
तूं वज्रशरीरी महाबळी ॥ निशाचर कांपती तूतें ॥३९॥
आमुचे वचन साचे करावें ॥ ब्रह्मपाशी त्वां सांपडावें ॥
सभेपर्यंत उगेंचि यावें ॥ मग दावावें पराक्रमा ॥४०॥
ऐसें कमलोद्‌भवें विनविलें ॥ समीरात्मजें मान्य केलें ॥
मग विरिंचीनें पाश पेरिले ॥ माजी बांधीलें हनुमंता ॥४१॥
हनुमंत बांधिला पाशीं ॥ शक्रारि धांवला वेगेंसी ॥
दृढ बांधितां जाहला कपीसी ॥ निजहस्तेंकरूनियां ॥४२॥
एक तृणवेंटीनें पाय बांधिती ॥ एक वृक्षसालीनें आंवळिती ॥
एक दोर आणावया धांवती ॥ नगरामाजी सत्वर ॥४३॥
हनुमंत दिसे बांधिला ॥ परी तो सर्वदाही मोकळा ॥
जैसा ज्ञानी संसारीं गुंतला ॥ परी तो सर्वदाही मुक्त असे ॥४४॥
नलिनीपत्र जळीं खेळे ॥ परी त्यावरी बिंदु नातळे ॥
कीं शीतोष्ण धुळीनें न मळे ॥ निराळ जैसें सर्वदा ॥४५॥
कीं समीर सर्वांवरून जात ॥ परी कोठेंचि नव्हे लिप्त ॥
तैसाचि वीर हनुमंत ॥ बंधमोक्षातीत जो ॥४६॥
असो परमेष्ठी आणि इंद्रजित ॥ सभेंसी आणिती हनुमंत ॥
वाटेसी राक्षस टोंचित ॥ नाना शस्त्रें घेऊनियां ॥४७॥
शस्त्रें भंगली समग्न ॥ वज्रशरीरी तो वानर ॥
असुरीं उचलोनी तो सत्वर ॥ सभेसमोर आणिला ॥४८॥
दृष्टीं देखतां हनुमंत ॥ रावण करकरां दांत खात ॥
याउपरी रघुनाथदूत ॥ काय करिता जाहला ॥४९॥
बंधनें तोडूनि समस्त ॥ पुच्छासनीं बैसला हनुमंत ॥
रावणाहून एक हस्त ॥ उंच आसन मारुतीचें ॥५०॥
मग पुसे प्रधान प्रहस्त ॥ तूं कोणाचा आहेस दूत ॥
परी तो न बोले हनुमंत ॥ पाहे चकित उगाचि ॥५१॥
मग पुसे द्विपंचवदन ॥ मर्कटा तूं कोणाचा कोण ॥
यावरी जनकजाशोकहरण ॥ काय वचन बोलत ॥५२॥
म्हणे रे मशका रजनीचरा ॥ महामळिणा दुर्जना पामरा ॥
मी कोण आहे तुज तस्करा ॥ कळलें नाहीं अद्यापि ॥५३॥
जेणें स्वयंवरीं तुज वांचविलें ॥ उरावरोनि चाप काढिलें ॥
त्याचा दास मी जाण वहिलें ॥ शिरकमळें छेदीन तुझीं ॥५४॥
जेणें ताटिका सुबाहु मारून ॥ केलें कौशिकमखपाळण ॥
मूढा त्याचा दास मी आहे पूर्ण ॥ करीन दहन लंकेचें ॥५५॥
तुझे भगिनीचें नासिक छेदिलें ॥ खर दूषण त्रिशिरा मारिले ॥
त्याचा दूत मी आलों बळें ॥ शिक्षा तुज लावावया ॥५६॥
जैसें अन्नसदनी रिघे श्वान ॥ तैसा पंचवटीस येऊन ॥
चोरिलें जानकी चिद्रत्‍न ॥ महामलिना अपवित्रा ॥५७॥
रामपंचानानची वस्तु ॥ कैसा ठेविशील तूं बस्तु ॥
पाडून वासुकीचा दांतु ॥ मंडूक वांचेल कैसा पां ॥५८॥
व्याघ्र असतां निद्रिस्त ॥ बाहेर जिव्हा लळलळित ॥
ती तोडोनि जंबुक यथार्थ ॥ कैसा वांचेल सांग पां ॥५९॥
तुझा अखया मारून ॥ विध्वंसिलें म्यां अशोकवन ॥
तुझें दळ अवघें मर्दून ॥ इंद्रजित गांजिला ॥६०॥
राक्षसकुळवैश्वानर ॥ अयोध्याप्रभु कौसल्याकुमार ॥
तुझें छेदावया शिर ॥ समरधीर येत आतां ॥६१॥
तो विषयकंठवंद्य रघुनंदन ॥ तुझे दश कंठ छेदून ॥
दशदिशांसि वळी देऊन ॥ सीता घेऊन जाईल ॥६२॥
ऐसें ऐकतां द्विपंचवदन ॥ जाहला परम क्रोधायमान ॥
म्हणे यांचें पुच्छ नासिक कर्ण ॥ जिव्हा छेदून टाका रे ॥६३॥
ऐसें बोलता लंकेश ॥ चौताळले महाराक्षस ॥
पुच्छावरी आसमास ॥ शस्त्रघाय मारिती ॥६४॥
धांपा दाटती हाणतां वैभवें ॥ परी त्याचे रोमही वक्र नोहे ॥
भय घेतलें दशग्रीवें ॥ म्हणे बरवें दिसेना ॥६५॥
मग विचारी निजमनीं ॥ हा रामउपासक सत्यवचनी ॥
तरी याचा मृत्यु कैसेनि ॥ आण घालूनि विचारूं ॥६६॥
मग म्हणे तुज रघुपतीची आण ॥ सत्य सांग तुझें मृत्यांग कोण ॥
येरू म्हणे मज नाहीं मरण ॥ ऐकोनि रावण हांसत ॥६७॥
ब्रह्म्य़ासही आहे मरण ॥ तेथें तुझा कीटका पाड कोण ॥
येरू म्हणे पुच्छा होईल दहन ॥ तैंच मरण आम्हांसी ॥६८॥
तैलें वस्त्रें भिजवून ॥ पुच्छ गुंडाळूनि लावा अग्न ॥
क्षणामाजी भस्म होऊन ॥ सर्व जाईल निर्धारें ॥६९॥
वस्त्रें गुंडाळा बहुत ॥ तेणें अग्नि चेतेल अद्‌भुत ॥
क्षणामध्यें होईल अंत ॥ उशीर येथें न लगेचि ॥७०॥
रावण म्हणे हें साचार ॥ मग स्नेहेंसहित वस्त्रभार ॥
पुच्छा गुडाळिती समग्र ॥ वायुकुमर काय बोले ॥७१॥
म्हणे पुच्छ उघडें राहतां ॥ मग मज नाटज्ञेपे हे तत्वतां ॥
राक्षस भागले वस्त्रें गुंडाळितां ॥ पुच्छ सर्वथा न सरेचि ॥७२॥
वस्त्रराशी आटल्या समग्र ॥ अधिकाधिक वाढें पुच्छाग्र ॥
जैसें पंडितबुद्धीचा प्रसर ॥ बोलतां बहु न सरेचि ॥७३॥
कीं महाकवीची पद्यरचना ॥ अपार लिहितां ते सरेना ॥
रामगुणांची वर्णना ॥ वर्णितां शेषा नाटोपे ॥७४॥
तैसें मारुतीचें पुच्छ अद्‌भुत ॥ राक्षसांसि नव्हे गणित ॥
जैसा अजारक्षकांसी निश्चित ॥ वेदार्थपार समजेना ॥७५॥
असो सरल्या वस्त्रांच्या राशी ॥ शेवटीं नग्न केले नगरवासी ॥
कोठें न मिळे एक दशी ॥ बहुत प्रयासें शोधितां ॥७६॥
रावणीवसा नग्न केला ॥ तरी पुच्छाग्र उघडा राहिला ॥
निःशेष तंतुमात्र उरला ॥ नाहीं कोठें नगरांत ॥७७॥
हनुमंत म्हणे अणुमात्र रितें ॥ राहतां बोले नाहीं मातें ॥
एक काढूनि यज्ञोपवीतें ॥ भयें पुच्छासी गुंडाळिती ॥७८॥
तैल घृत नवनीत ॥ शोधितां न मिळे निश्चित ॥
विंशतिचक्षूसी सांगती दूत ॥ स्नेह वस्त्रें न मिळती कोठें ॥७९॥
राजसेवक फिरती नग्न ॥ उभयद्वारें मुक्त सोडून ॥
नगरींचे लज्जेनें जन ॥ कपाटें झांकून बैसले ॥८०॥
एक बैसले अंधारीं ॥ एक निघाले विवरीं ॥
एक नेत्र लावून निशा थोरी ॥ दिवस असतां केली हो ॥८१॥
वृद्ध वृद्ध एक बोलती ॥ पुढें दिसे बरवी गति ॥
हें लंकानगर अंती ॥ भस्म होईल दिसतसे ॥८२॥
असो वस्त्रें न मिळती निश्चित ॥ पुच्छ उघडें एक हस्त ॥
रावण म्हणे अशोकवनांत ॥ वस्त्रें असती सीतेपाशीं ॥८३॥
ऐकतां तयाच्या उत्तरा ॥ हनुमंत आवरी पुच्छाग्रा ॥
दूत सांगती दशकंधरा ॥ अणुमात्र पुच्छ उरलें नसे ॥८४॥
तेथें कासया पाहिजे वस्त्र ॥ लंकेश म्हणे लावा रे वैश्वानर ॥
चुडी लाविती रजनीचर ॥ अनळ साचार स्पर्शेना ॥८५॥
नाना उपाय योजिती ॥ परी न लागेचि अग्निज्योति ॥
रावण पुसे मारुती ॥ अनळ कां रे स्पर्शेना ॥८६॥
मग बोले अशोकवनारी ॥ पुच्छयज्ञ होती तुझे घरीं ॥
तरी सेवकाहातीं निर्धारीं ॥ मूर्खा किमर्थ फुंकविसी ॥८७॥
तरी तूं स्वमुखेंकरून ॥ चेतवी सत्वर कृशान ॥
न लागतां एक क्षण ॥ ज्वाळा येथें उठती ॥८८॥
ऐसें बोलतां अंजनींसुतें ॥ तें मानलें दशमुखातें ॥
परी अंतरीं पावला भयातें ॥ मग धैर्य धरूनि उठियेला ॥८९॥
ते वेळे निजमुखें दाहक ॥ बळें फुंकी लंकानायक ॥
हनुमंतें बंधु आणि जनक ॥ अनळ अनिळ स्मरियेला ॥९०॥
तों एकाएकीं अग्न धडकला ॥ दाही मुखीं झोंबती ज्वाळा ॥
दाढ्या मिशा तेव्हां सकळा ॥ भस्म केल्या जाळूनि ॥९१॥
रावणें पाप केले बहुत ॥ पुढें रामबाणें यासी देहांत ॥
यालागीं अगोदर प्रायश्चित्त ॥ राघवप्रियें दिधलें कीं ॥९२॥
दशमुखीं पोळला दशकंधर ॥ दिसे दग्धकांतार ॥
असो मुखासी लावूनियां वस्त्र ॥ निजासनीं बैसला ॥९३॥
तंव धडकला पुच्छवन्हि ॥ हनुमंत गडबडां लोळे धरणीं ॥
काकुळती ये म्हणे सोडी कोणी ॥ असुर मनीं आनंदले ॥९४॥
म्हणती हे बरवें जाहलें ॥ अखयादिकांसी येणें मारिलें ॥
मर्कटें बहुतांसी संहारिलें ॥ विटंबिलें इंद्रजिता ॥९५॥
मग विरिंचीनें धरिला युक्तीं ॥ दशमुखें योजिली बरवी गती ॥
अग्न लाविला पुच्छाप्रति ॥ मरेल निश्चितीं आतांचि ॥९६॥
येरू चडफडी तडफडी ॥ उडे पडे भूमीसी गडबडी ॥
आपली मांडी थापटोनि दाढी ॥ रावणाची गेला धरावया ॥९७॥
तों दाढीच नाहीं निःशेष ॥ तेणें रावणासी बसला दचक ॥
देखोन करी हास्यमुख ॥ म्हणे अनर्थ दिसता पुढें ॥९८॥
हनुमंत म्हणे असुरांप्रति ॥ मज सोडवावें समस्तीं ॥
ऐका माझी एक विनंति ॥ धांवे मारुती पुढेंचि ॥९९॥
तंव ते पळती दूरदूर ॥ पुच्छें आकर्षूनि असुर ॥
दाढ्या जाळियेल्या समग्र ॥ प्रळय थोर मांडला ॥१००॥
गरगरां पुच्छ तये वेळां ॥ भवंडितां झळकती प्रळयज्वाळा ॥
राक्षस करूनियां गोळा ॥ पुच्छाग्नींत भस्म करी ॥१॥
सभा सांडोनि पळती असुर ॥ हनुमंत म्हणे उभे स्थिर ॥
मज सोडवा तुम्ही समग्र ॥ म्हणोनि भेटे तयांतें ॥२॥
शतांचीं शतें ते क्षणीं ॥ यामिनीचर पुच्छें बांधोनी ॥
रावणापाशीं आणी ओढोनी ॥ म्हणे कां हे पळताती ॥३॥
असो सीतेसी राक्षसी सांगत ॥ तुझा वानर मेला गे यथार्थ ॥
ऐकतां जानकी शोक करीत ॥ म्हणे विपरीत केवीं घडे ॥४॥
मशकें सागर शोषिला ॥ जंबुकांनीं सिंह केवीं धरिला ॥
खद्योतांनी सूर्य पाडिला ॥ खालीं कैसा आसडोनी ॥५॥
वज्र भंगलें लागतां कमळ ॥ पतंगें ग्रासिला वडवानळ ॥
भोगींद्राचें फणिमंडळ ॥ वटबीजभारें दडपलें ॥६॥
मक्षिकेच्या पक्षवातेंकरूनी ॥ प्रळयमेघ गेला विदारूनी ॥
पिपीलिकाभारें कोसळोनी ॥ कनकाद्रि कैसा पडियेला ॥७॥
पुष्पहार पडतां सृष्टीं ॥ केवीं दणाणे कूर्मपृष्ठी ॥
चित्रींच्या लेपें उठाउठी ॥ प्रळयचपळा ग्रासिली ॥८॥
असो रुद्रावतार हनुमंत ॥ तो राक्षसीं जाळिला अग्नींत ॥
कैसी घडली ही मात ॥ विचारीत राघवप्रिया ॥९॥
जठराग्नीस सीता पुसत ॥ तो म्हणे क्षेम आहे हनुमंत ॥
नगर मी जाळीन समस्त ॥ बंधुसाह्याकारणें ॥११०॥
असो इकडे समस्त असुर ॥ हनुमंतावरी करिती शस्त्रमार ॥
तों पुच्छग्नि धडकला थोर ॥ पळती असुर चहूंकडे ॥११॥
नानाशस्त्रें बाण शक्ती ॥ दुरोनि कपींद्रावरी टकिती ॥
मग मिष घेऊन मारुती ॥ गतप्राण पडियेला ॥१२॥
मूर्च्छित पडतांचि वानर ॥ जवळी धांविन्नले असुर ॥
जो तो म्हणे म्यां घाय थोर ॥ वर्मीं पाहून दीधला ॥१३॥
म्हणोनि मेला हा वानर ॥ जो तो म्हणे हा प्रचंड वीर ॥
सांगती रावणासी बडिवार ॥ सुखें निद्रा करीं आतां ॥१४॥
मेलिया सारिखें मिष घेऊनी ॥ दोन घटिका पडिला मेदिनीं ॥
राक्षस बहुत मिळोनी ॥ सभोंवते विलोकिती ॥१५॥
फेंस वाहतसे वदनीं ॥ वैद्य नाडी पाहती विलोकुनी ॥
म्हणती केवढा पुरुषार्थ करूनी ॥ वानर शेवटीं मेला हो ॥१६॥
ऐसें समस्त जों पाहत ॥ तों हनुमंत उडाला अकस्मात ॥
पुच्छें बांधिले समस्त ॥ राक्षस जळत धडधडां ॥१७॥
कित्येक पळाले असुर ॥ एकला उरला दशकंधर ॥
त्यासी म्हणे रक्षणार ॥ तुज कोण असे आतां ॥१८॥
शक्रारीस म्हणे रावण ॥ यावरी लोहपाश घालून ॥
ग्रीवा हस्त बांधून ॥ लंकेमाजीं फिरविजें ॥१९॥
मग इंद्रजितें पाश घालून ॥ बांधिला तेव्हां वायुनंदन ॥
नगरामाजीं नेऊन ॥ हिंडविती हनुमंता ॥१२०॥
जैसें पुटीं पडतां सुवर्ण ॥ तेजस्वी दिसे दैदीप्यमान ॥
त्यापरी सीताशोकहरण ॥ अग्निसंगें शुद्ध दिसे ॥२१॥
आळोआळीं फिरवित ॥ हनुमंत सहज पाळती घेत ॥
निंदकांचीं तोंडें लासित ॥ लोक पळती बिदोबिदीं ॥२२॥
जाहला एकचि हाहाकार ॥ भलती स्त्री म्हणे तूं माझा भ्रातार ॥
मज येथून काढीं बाहेर ॥ लावील वानर अग्नि आतां ॥२३॥
हनुमंत म्हणे समस्त असुरां ॥ मज तुम्ही आतां दृढ धरा ॥
सर्षप्राय होऊनि सत्वरां ॥ निघोनि गेला क्षणमात्रें ॥२४॥
हनुमंत गदागदां हांसत ॥ राक्षसांसी वांकुल्या दावित ॥
लंकेसी अग्नि लावित ॥ सुटला अद्‌भुत प्रभंजन ॥२५॥
माड्या गोपुरें धवळारें ॥ राणिवसाचीं सुंदर मंदिरें ॥
सकळ नगर महाद्वारें ॥ एकसरें धडकलीं ॥२६॥
कपीनें मांडिलें लंकादहन ॥ त्यासी साह्य झाला पवन ॥
नग्न होऊनि नगरजन ॥ सदनें सोडून पळाले ॥२७॥
थोर विषय संसारीं धन ॥ त्याहून आगळें अपत्य पूर्ण ॥
त्याहून दारा विशेष जाण ॥ त्याहून आस्था प्राणांची ॥२८॥
त्याहून विशेष निजप्राणत्याग ॥ इंद्रियांवरी उदास मग ॥
देहममता धरी निःसंग ॥ विषयभोग सांडिलिया ॥२९॥
त्यासी न झगटे मोह ममतां ॥ मग इतर जनांची काय कथा ॥
न करी कोण कोणाची आस्था ॥ पळती जीव घेऊनियां ॥१३०॥
पुरुषाविण मोहें अत्यंत नारी ॥ उडी घालिती जळते घरीं ॥
बळें ओढून काढितां बाहेरी ॥ जीवित्वावरी उदास त्या ॥३१॥
असंभाव्य दाटल्या ज्वाळा ॥ ग्रासूं इच्छिती नभमंडळा ॥
कीं कल्पांतरुद्र क्षोभला ॥ रावणावरी ते काळीं ॥३२॥
धूम्र दशदिशांतें दाटी ॥ कोण कोणास न दिसे दृष्टीं ॥
वंशनळे नभाच्या पोटीं ॥ असंख्यात उडती पैं ॥३३॥
आतां असो बहुत बोली ॥ तृतीयभाग लंका जाळिली ॥
परी ते सुवर्णमय जाहली ॥ श्रीरामभक्तप्रतापें ॥३४॥
लोहघणें परिस फोडिला ॥ परी तो अवघाचि सुवर्ण जाहला ॥
तेवीं लंकानगर ते वेळां ॥ हेममय ओतिलें ॥३५॥
हनुमंतें लंकादहन केलियावरी ॥ निजमानसीं विचार करी ॥
श्रीराम दर्शनासी झडकरी ॥ जावें आतां त्वरेनें ॥३६॥
मग उडाला वायुकुमर ॥ समुद्रातीरा आला सत्वर ॥
पुच्छ विझवितां नदीश्वर ॥ काकुळती बहु आला ॥३७॥
जलचरें उकडोनि मरती ॥ तूं कडसे बैसें गा मारुती ॥
याउपरी अवनिजापती दास ॥ तीरीं बैसला ॥३८॥
सरितापतीनें निजबळें ॥ निजलाटेनें पुच्छ विझविलें ॥
कीं याजकें अग्नीस आच्छादिलें ॥ कुंडमंडपामाझारीं ॥३९॥
कपाळींचा स्वेद पुसोनि टाकिला ॥ तो पुढें मकरध्वज जन्मला ॥
असो कपि मागें पाहूं लागला ॥ तों लंका भडभडां जळतसे ॥१४०॥
असंभाव्य चेतला अग्न ॥ म्हणे जनकजा जाईल भस्म होऊन ॥
कार्य नासेल म्हणून ॥ वायुनंदन शोक करी ॥४१॥
मग म्हणे करितां रामस्मरण ॥ मज न बाधी प्रळयाग्न ॥
माझे जगन्मातेसी विघ्न ॥ केवीं कृशान करूं शके ॥४२॥
स्मरतां रघुवीर नाम निर्मळ ॥ शिवकंठींचें हाळाहळ ॥
शीतळ जाहलें तात्काळ ॥ नामामृतें करूनियां ॥४३॥
तों वायुदेव सांगे ते वेळां ॥ सुखी आहे जनकबाळा ॥
ते त्रिभुवनपतीची चित्कळा ॥ ब्रह्मांडमाळा घडी मोडी ॥४४॥
यावरी लोकप्राणेशनंदन ॥ म्हणे क्षुधित जाहले नयन ॥
मित्रकुळभूषणाचे चरण ॥ पाहावयालागी उदित ॥४५॥
तो मंगळजननीजा जीवन ॥ मज पुसेल वर्तमान ॥
तरी कीर्ति स्वमुखेंकरून ॥ वर्णितां दूषण लागेल ॥४६॥
यश धर्म विद्या पुरुषार्थ ॥ बळ पराक्रम आणि तीर्थ ॥
हें स्वमुखें जो वर्णित ॥ तरी हानि सत्य शास्त्र म्हणे ॥४७॥
मग गुप्तरूपें वायुनंदन ॥ घेत परमेष्ठीचें दर्शन ॥
म्हणे मी अयोध्यापतीचे चरण ॥ पाहावया जातसें ॥४८॥
तरी येथें वर्तला जो वृत्तांत ॥ तो पत्रीं लिहावा साद्यंत ॥
ऐकतां विष्णुनाभसुत ॥ ब्रह्मानंदें उचंबळला ॥४९॥
म्हणे धन्य हनुमंता तुझें ज्ञान ॥ मजही त्वां केलें पावन ॥
मग तात्काळ पत्र लिहून ॥ हनुमंतापाशीं दिधलें ॥१५०॥
ब्रह्मायाची आज्ञा घेऊनी ॥ प्रवेशला अशोकवनीं ॥
साष्टांगेंसीं जनकनंदिनी ॥ सद्रद होऊनि नमियेली ॥५१॥
मग बोले जनकबाळा ॥ आतां कधीं येशील वेल्हाळा ॥
विमळांबुधारा ते वेळां ॥ नेत्रीं आल्या जानकीच्या ॥५२॥
जो दशरथाचा महापुण्यमेरू ॥ जो ब्रह्मांडनायक जगद्‌गुरु ॥
जो भक्तमंदिरांगणमांदारू ॥ तयाचे दर्शना जातों मी ॥५३॥
हनुमंत म्हणे जगन्माते ॥ राघववल्लभे गुणसरिते ॥
कमळप्रिये कमलो द्‌भूते ॥ चिंता न करी सर्वथा ॥५४॥
माते उदयिक जाण दोनप्रहरां ॥ राघव आणितों समुद्रतीरा ॥
तो राक्षसांसहित दैत्येंद्रा ॥ वधून तुज सोडवील ॥५५॥
मज कांही खूण द्यावी यथार्थ ॥ जेणें मज धन्य म्हणेल रघुनाथ ॥
मग वेणींचा मणी दैदीप्यवंत ॥ मारुतीचे हातीं ओपिला ॥५६॥
मागुती अंजनीहृदयरत्‍न ॥ म्हणे कांहीं सांग अंतरखूण ॥
तो ताटिकांतक मखपाळण ॥ जेणेंकरूनि संतोषे ॥५७॥
जानकी म्हणे चित्रकूटपर्वतीं ॥ आम्ही काळ क्रमिला जैं मारुती ॥
सुमित्रात्मज वनाप्रति ॥ गेला होतां एकदां ॥५८॥
एकांतींचे अवसरीं ॥ रघुपतीच्या अंकावरी ॥
शिर ठेवूनि निर्धारीं ॥ हनुमंता मी निजल्यें पैं ॥५९॥
प्रीतीकरून तमालनील ॥ परम सुवास जो मनसीळ ॥
तो उगाळून स्वकरें तत्काळ ॥ टिळक रेखिला भाळीं माझे ॥१६०॥
हे गोष्टी जाणे रघुनंदन ॥ मारुती सांग हे अंतरखूण ॥
ऐसें ऐकतां वायुनंदन ॥ परम हर्ष पावला ॥६१॥
जानकी म्हणे समुद्रजळ ॥ शतयोजनें भरलें तुंबळ ॥
असंख्यात वानरदळ ॥ कैसें येईल ऐलतीरा ॥६२॥
येरू म्हणे राघव शरीं ॥ सेतु बांधील समुद्रावरी ॥
अथवा माझिया पुच्छेंकरी ॥ सेतु बांधील अभंग ॥६३॥
ना तरी राघवबाण वडवानळ ॥ शोषून टाकील समुद्रजळ ॥
अथवा उड्डाण करून सकळ ॥ सुवेळेसी पैं येऊं ॥६४॥
जेणें स्तंभाविणें धरिलें नभ ॥ जीवनावरी पृथ्वी ठेवी स्ययंभ ॥
तो जानकी तुझा वल्लभ ॥ काय एक करूं न शके ॥६५॥
जननीचें जठरकुहरीं ॥ प्राणी वसे नवमासवरी ॥
तेथें रक्षी नानापरी ॥ तो काय एक करूं न शके ॥६६॥
बाहेर उजजतांच अवधारा ॥ मातेचें स्तनीं दुग्धधारा ॥
लावितो परात्पर सोयरा ॥ तो काय एक करूं न शके ॥६७॥
क्षणें एवढें ब्रह्मांड दावी ॥ सवेंच मागुतें लपवी ॥
तो राम त्रिभुवनगोसावी ॥ काय एक करूं न शके ॥६८॥
जैसा गगनीं एकचि मित्र ॥ परी प्रकाश करी सर्वत्र ॥
तैसा जगद्य्वापक रघुवीर ॥ काय एक करूं न शके ॥६९॥
वपु नवच्छिद्रमय भग्न ॥ परी मर्यादेवेगळा न जाय प्राण ॥
तैसा अयोध्यानाथ जगन्मोहन ॥ काय एक करूं न शके ॥१७०॥
गोष्टी असोत बहुत आतां ॥ वेद शिणले कीर्ति गातां ॥
उदयिक दोनप्रहरां रघुनाथा ॥ समुद्रतीरा आणितों ॥७१॥
तुज मी आतांच नेतों माते ॥ परी शुद्धि सांगितली रघुनाथें ॥
पुढील भविष्याची मतें ॥ ठाऊन नसती जननीये ॥७२॥
असो सीतेची आज्ञा घेऊन ॥ साष्टांगें नमी वायुनंदन ॥
यशस्वी रघुनाथ म्हणोन ॥ गगनपंथें उडाला ॥७३॥
सकळ देव म्हणती हनुमंता ॥ त्वरितगतीं आणावें रघुनाथा ॥
तूं आमुचा प्राणदाता ॥ सोडवीं येथून आम्हांसी ॥७४॥
हनुमंत म्हणे देवांसी ॥ नका चिंता करूं मानसीं ॥
उदयिक राम समुद्रतीरासी ॥ निर्धारेंसी आणितों ॥७५॥
यावरी लंकागिरीशिखरीं ॥ उभा राहिला वानरकेसरी ॥
भुभुःकार केला ऐलतीरीं ॥ सकळ वानरीं ऐकिला ॥७६॥
लंकागिरीहूनि उडाला ॥ योजनद्वय पाठार दडपिला ॥
उड्डाणासरसा समुद्र भ्याला ॥ मारुती आला ऐलतीरा ॥७७॥
निशांतीं उगवे चंडकिरण ॥ कीं वैकुंठींहून उतरे सुपर्ण ॥
कीं मानसतीर लक्षून ॥ राजहंस उतरला ॥७८॥
महेंद्रपर्वतावरी हनुमंत ॥ उभा ठाकला अकस्मात ॥
जांबुवंतादि वानर समस्त ॥ भेटावया धांविन्नले ॥७९॥
थोर थोर वानर भेटती ॥ एक जघनासी आलिंगिती ॥
एक जानु जंधा कवळिती ॥ एक लागती पायांतें ॥१८०॥
एक पुच्छासी देती आलिंगन ॥ एक पुच्छाग्रीं देती चुंबन ॥
एक मान घुलकावून ॥ वांकुल्या दाविती ऊर्ध्वपंथें ॥८१॥
एक टाळिया वाजवून कोंडें ॥ नृत्य करिती मारुतीपुढें ॥
एक चक्राकार उडे ॥ वर्णिती पवाडे श्रीरामाचे ॥८२॥
एक करिती थोर भुभुःकार ॥ एक साष्टांग घालिती नमस्कार ॥
एक म्हणती श्रीरामचंद्र ॥ तेथें सत्वर जाऊं चला ॥८३॥
पुष्पें आणुनी ते अवसरीं ॥ हनुमंत पूजिला वानरीं ॥
जैसा सकळ सुरवरीं ॥ अपर्णावर पूजियेला ॥८४॥
मारुतीचे आंगावरील मळ ॥ देखोन कपी पुसती सकळ ॥
लंकेत प्रताप केला समूळ ॥ सांग आम्हा हनुमंता ॥८५॥
परी कदा न सांगे मारुती ॥ ब्रह्मलिखित देत हातीं ॥
परी ते वानर न उकलिती ॥ विरिंचिमुद्रांकित जें ॥८६॥
मग म्हणती वानर ॥ कळेल किष्किंधेसी समाचार ॥
एथें उकलूनि पाहतां पत्र ॥ तरी चतुर हांसती ॥८७॥
असो मारुतीसह वानरगण ॥ किष्किंधेसी आले न लागतां क्षण ॥
सुग्रीवाचें मधुवन ॥ मोडिलें तेव्हां क्षणमात्रें ॥८८॥
सुग्रीवासी सांगती वानरगण ॥ वानरांसह आला वायुनंदन ॥
तुझें आवडतें क्रीडास्थान ॥ तें मधुवन मोडिलें ॥८९॥
ऐकतां सीतापति तारापति ॥ म्हणती विजयी झाला मारुति ॥
तरीच मधुवन मोडिती ॥ वानर आनंदेंकरूनियां ॥१९०॥
असो मधुवनींहून अंजनीसुत ॥ वानरांसह उडाला अकस्मात ॥
पंपासरोवरावरी असे रघुनाथ ॥ आला तेथें स्वानंदें ॥९१॥
सपक्ष उतरला पर्वत ॥ कीं भूमीवरी आला आदित्य ॥
कीं मायाचक्र निरसोनि पावत ॥ योगी जैसा स्वरूपातें ॥९२॥
लंकेमाजीं विजयी जाहला ॥ म्हणून दक्षिणबाहू उभारिला ॥
रघुनाथें हनुमंत देखिला ॥ प्रसन्नवदन ते काळीं ॥९३॥
साधक साधूनी महानिधान ॥ दिसे जैसा सुप्रसन्न ॥
कीं सुधारस हरिलिया सुपर्ण ॥ विराजमाल परत जैसा ॥९४॥
कीं अमृतसंजीवनी अद्‌भुत ॥ साधूनि आला गुरुसुत ॥
सहस्राक्ष जैसा आनंदत ॥ सीतानाथ तोषला तैसा ॥९५॥
अयोध्यापति किष्किंधापती ॥ आसन सोडून पुढें धांवती ॥
तों लोटांगण घाली मारुति ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥९६॥
परम स्नेहाळू रघुनंदन ॥ मारुतीतें हस्तें उचलोन ॥
देता जाहला क्षेमालिंगन ॥ भरलें गगन आनंदें ॥९७॥
प्राणसखा हनुमंत ॥ हृदयीं धरी रघुनाथ ॥
पुढतीं सोडावा हा हेत ॥ मनामाजी उपजेना ॥९८॥
असो हनुमंतासी क्षेम देऊनी ॥ सकळ कपींसी भेटे चापपाणी ॥
जांबुवंत अंगद प्रीतीकरूनी ॥ हृदयीं धरिलें रघुत्तमें ॥९९॥
सुग्रीवें धांवोनियां प्रीतीं ॥ हृदयीं धरिला मारुती ॥
कीं इंद्रासी भेटला बृहस्पती ॥ आलिंगन शोभलें तैसें ॥२००॥
मग राजाधिराज समर्थ ॥ सभा करूनि बैसला रघुनाथ ॥
तेव्हां मणि आणि ब्रह्मलिखित ॥ पुढें ठेविलें हनुमंतें ॥१॥
मग आनंदें सकळ वर्तमान ॥ दंडी ऋषिपुत्रापसून ॥
पुढें सुप्रभेचें उद्धरण ॥ तेंही कथिलें तेधवां ॥२॥
पुढें समुद्रतीरपर्यंत ॥ अंगदें कथिलें समस्त ॥
शुद्धि नव्हे म्हणोनि अद्‌भुत ॥ अग्न चेतविला वानरीं ॥३॥
प्राण देतां अग्नीमाझारी ॥ हनुमंतें रक्षिलें ते अवसरीं ॥
मग संपाती भेटला समुद्रतीरीं ॥ तेणें शुद्धि सांगितली ॥४॥
याउपरी वायुकुमर ॥ शतयोजनें उडाला सागर ॥
पुढें लंकेत झाला जो समाचार ॥ तो हनुमंत न सांगेचि ॥५॥
मग रामें हनुमंताकडे पाहिलें ॥ तंव येरू म्हणे जे वर्तमान जाहलें ॥
तें विरिंचीनें असे पत्रीं लिहिलें ॥ निजहस्तें करूनियां ॥६॥
जगद्वंद्या अयोध्यापति ॥ सुखरूप आहे सीता सती ॥
मणि खूण दिधला माझे हातीं ॥ परम सद्रद होऊनियां ॥७॥
अंतरखूण सांगितली ॥ मनसीळ लाविला माझिये भाळीं ॥
रघूत्तमें ऐकतां हृदयकमळीं ॥ तये काळीं गहिंवरला ॥८॥
मणि हृदयीं धरून रघुनाथ ॥ अत्यंत जाहला शोकाकुलित ॥
अहा सीता म्हणोनि बोलत ॥ देखतां अर्कज गहिंवरला ॥९॥
हनुमंत म्हणे रघुराजा ॥ सुखी आहे जनकात्मजा ॥
परी तुझ्या वियोगें भरताग्रजा ॥ अत्यंत कृश जाहली असे ॥२१०॥
म्यां मुद्रिका दिधली नेऊन ॥ ते मनगटीं खेळे जैसें कंकण ॥
मग म्हणे रघुनंदन ॥ केंवी प्राण उरला असे ॥११॥
रघुपति तुझें नामामृत ॥ तेणें जानकी वांचली सत्य ॥
जैसा शशांक राहुग्रस्त ॥ चिंतेनें तैसी झांकिली ॥१२॥
मग बोले तमालनीळ ॥ कैसा तरलासी समुद्रजळ ॥
यावरी अंजनीचा बाळ ॥ काय बोलता जाहला ॥१३॥
तुझिये मुद्रिकेचें अद्‌भुत बळ ॥ क्षणें जिंकवेल कळिकाळ ॥
नखाग्रीं समुद्रजळ ॥ सांठविजेल सर्वही ॥१४॥
मग विरिंचीचें लिखित पत्र ॥ सौमित्राजवळी देत राजीवनेत्र ॥
वाचिता जाहला भोगींद्र ॥ सावधान वानर ऐकती ॥१५॥
स्थिर राहिला समीर ॥ ऐकावया विरिंचिपत्र ॥
सौमित्रें उकलिलें साचार ॥ जेवीं चंद्र पौर्णिमेचा ॥१६॥
जो सरस्वतीचा जनिता ॥ त्याचिया अक्षराची कौशल्यता ॥
कोणासी न वर्णवे तत्वतां ॥ तें श्रोतीं आतां परिसावें ॥१७॥
परब्रह्म केवळ रघुवीर ॥ त्यासी ब्रह्मदेवें लिहिलें पत्र ॥
तें ब्रह्मांनंदकृपें श्रीधर ॥ अति पवित्र वर्णींल पैं ॥१८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२१९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय बाविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
उकलोनी कमलोद्‌भवाचें पत्र ॥ वाचिता जाहला सौमित्र ॥
सावध ऐके राजीवनेत्र ॥ सूर्यपुत्रादि कपि सर्वही ॥१॥
अनंतकोटीब्रह्मांडनायका ॥ हे दयार्णवा विश्वपाळका ॥
वैकुंठपते विश्वव्यापका ॥ मम जनका श्रीवल्लभा ॥२॥
हे राम सकळबंधछेदका ॥ हे राम साधुप्रतिपाळका ॥
दुष्टरजनीचरसंहारका ॥ जानकीनायका जगद्‌गु ॥३॥
हे राम जगदंकुरमूळकंदा ॥ साधुहृदयारविंदमिलिंदा ॥
निजजनचातकजलदा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥४॥
संसारगजविदारक मृगेंद्रा ॥ दुःखपर्वतभंजन वज्रधरा ॥
निजभक्तचकोर सुधाकरा ॥ अतिउदारा सीताधवा ॥५॥
त्रिभुवनजनका दुःखहरणा ॥ जनकजामाता जनपाळणा ॥
जनकजापते जलजनयना ॥ जलदवर्णा जगत्पते ॥६॥
जय जय राम वेदोद्धारका ॥ कमठरूपासृष्टिपाळका ॥
नमो सकळ दैत्यांतका ॥ वराहवेषा दीनबंधू ॥७॥
नमो हिरण्यकश्यपमर्दना ॥ नमो त्रिविक्रम बलिबंधना ॥
नमो ब्राह्मणकुळपाळणा ॥ भार्गवकुठदिवाकरा ॥८॥
नभो पौलस्तिकुलविपिनदहना ॥ मीनकेतनाहिरहृदयजीवना ॥
नमो चतुर्दशलोकपाळणा ॥ मखरक्षणा रघुवीरा ॥९॥
जय जय विश्वपाळणा ॥ विश्वव्यापका विश्वकारणा ॥
विश्वमतिचाळका विश्वजीवना ॥ विश्वरक्षणा विश्वेशा ॥१०॥
नमो मायाचक्रचाळका ॥ नमो अज्ञानतिमिरांतका ॥
नमो वेदरूपा वेदपाळका ॥ वेदस्थापका वेदवंद्या ॥११॥
नमो कमलनाभा कमलजीवना ॥ नमो पापारण्यकुठारतीक्ष्णा ॥
नमो त्रिविधदाहतापशमना ॥ अनंतशयना अनंता ॥१२॥
नमो दशावतारचरित्रचाळका ॥ नमो अनंतब्रह्मांडनायका ॥
नमो अनंतवेषकारका ॥ ताटिकांतका पापहरणा ॥१३॥
नमो जननमरणरोगवैद्या ॥ सच्चिदानंदा स्वसंवेद्या ॥
मायातीता जगवंद्या ॥ भेदाभेदातीत तूं ॥१४॥
नमो सर्गस्थित्यंताकारका ॥ नमो कैवल्यपददायका ॥
अज अजित सर्वात्मका ॥ करुणालया सुखाब्धे ॥१५॥
जय जय षड्विकाररहिता ॥ नमो षड्गुणअलंकृता ॥
अरिषड्वर्गच्छेदप्रतापवंता ॥ शब्दातीता निरंजना ॥१६॥
तूं निर्विकार निरंजन ॥ आम्हांलागीं जाहलासि सगुण ॥
बंदींचे सोडवावे सुरगण ॥ पिशिताशन वधोनियां ॥१७॥
पितृवचनाचें करूनि व्याज ॥ कानना आलासी रघुराज ॥
पंचवटीस राहून सहज ॥ बहुत राक्षस वधियेले ॥१८॥
दशमुखें केलें सीताहरण ॥ त्याचे करावया गवेषण ॥
म्हणोनि किष्किंधेसी आगमन ॥ जाहलें तुझें श्रीरामचंद्रा ॥१९॥
शुद्धीलागीं रुद्रावतार ॥ अंजनीहृदयारविंदभ्रमर ॥
जो ब्रह्मांडासी देणार धीर ॥ तरला सागर निमिषार्धें ॥२०॥
अगाध मारुतीचे उड्डाण ॥ बहुतीं वाटेस केलें विघ्न ॥
परी तो अनिवारकिराण ॥ कोणासही नाटोपे ॥२१॥
पडलंकेसी येऊन हनुमंत ॥ राक्षसी संहारिल्या बहुत ॥
प्रवेशला क्रौंचेच्या मुखांत ॥ दांतांस दांत मेळवीं जों ॥२२॥
उदर फोडोनि आला बाहेर ॥ मग शोधिलें निकुंभिलानगर ॥
सुलोचना देखोनि सुंदर ॥ म्हणे हेचि होय जानकी ॥२३॥
तिजवरी घालावया पाषाण ॥ सिद्ध जाहला वायुनंदन ॥
मग तिचे शब्द पसिसतां पूर्ण सीता नव्हे कळलें हें ॥२४॥
मग अणुप्रामाण होऊन ॥ प्रवेशला लंकाभुवन ॥
विटंबिले सकळजन ॥ करूनि नग्न बिदीसी ॥२५॥
पत्र ऐकतां जनकजापती ॥ म्हणे धन्य धन्य वीर मारुती ॥
अद्‌भुत कर्तव्य अगाध शक्ति ॥ त्रिजगतीं ऐसा नाहीं ॥२६॥
ऐकोनियां विनोदरीती ॥ वानर गदगदां हांसती ॥
एकावरी एक पडती ॥ मुरकुंड्या वळती ऐकतां ॥२७॥
नाना वस्तु उत्तम आणून ॥ वानर टाकिती ओवाळून ॥
एक सप्रेमें हृदयीं धरून ॥ म्हणती धन्य बलाढ्य तूं ॥२८॥
पत्र वाचितां लक्ष्मण ॥ क्षणक्षणां करी हास्यवदन ॥
मागुती तटस्थ झाले हरिगण ॥ पत्र पुढें परिसती ॥२९॥
शोधिलें बिभीषणाचें घर ॥ कीर्तन ऐकोनि झाला निर्भर ॥
मग कुंभकर्णाचें मंदिर ॥ देखोनिया कंटाळला ॥३०॥
रावणस्त्रिया ऐशीं सहस्र ॥ तितुक्या शोधूनि वायुकुमर ॥
राक्षससभा विटंबिली समग्र ॥ तें अगाध चरित्र न वर्णवे ॥३१॥
रावणसेजे मंदोदरी ॥ म्हणे हीच होईल सीता सुंदरी ॥
तंव ते झाले घाबरी ॥ दुष्ट स्वप्न देखोनियां ॥३२॥
दशकंठास सांगे वर्तमान ॥ विषकंठप्रिय रघुनंदन ॥
त्याची सीता द्याहो सोडून ॥ परी रावण न मानी तें ॥३३॥
सीता पहावया पाठविली दूती ॥ तिच्या मागें गेला मारुती ॥
तों अशोकवृक्षातळीं सीता सती ॥ देखोनि कपि नमितसे ॥३४॥
पुढें मुद्रिका ठेवून ॥ वृक्षावरी बैसला एक क्षण ॥
अपार राक्षसी झोडून ॥ पाडिल्या तेथें पराक्रमें ॥३५॥
मुद्रिका देखोनि सीता सती ॥ शोकसमुद्रीं करी वस्ती ॥
मग पुढें येऊन मारुती ॥ प्रत्यक्ष भेटला तेधवां ॥३६॥
सांगितलें सकळ वर्तमान ॥ मग क्षुधेचें मिष करून ॥
विध्वंसिलें अशोकवन ॥ जें विस्तीर्ण तीस योजनें ॥३७॥
रावणे पाठविला दळभार ॥ त्याचा तेक्षणीं केला संहार ॥
मारूनि रावणाचे पुत्र ॥ शक्रजित विटंबिला ॥३८॥
मग म्यां हनुमंतासी प्रार्थून ॥ ब्रह्मपाशीं नेला बांधोन ॥
रावणासी शब्दशस्त्रेंकरून ॥ सभेसी निर्भत्सिलें हनुमंतें ॥३९॥
मारुतीस मारावया सत्वर ॥ पुच्छासी लाविला वैश्वानर ॥
स्नेहेंसहित वस्त्रें अपार ॥ गुंडाळोनी साक्षेपें ॥४०॥
पुच्छ पेटतां सत्वर ॥ उडोनि गेला वायुपुत्र ॥
तृतीय भाग लंकानगर ॥ जाळिलें क्षण न लागतां ॥४१॥
परी नवल वर्तलें अद्‌भुत ॥ लंका सुवर्णमय जाहली समस्त ॥
धन्य तो लोकाप्राणेशसुत ॥ थोर सामर्थ्य दाविलें ॥४२॥
मग सागरीं पुच्छ विझवून ॥ पुन्हां घेतलें जानकीचें दर्शन ॥
जैसें बाळ खेळतां श्रमून ॥ जननीपाशीं येत पैं ॥४३॥
ऐसें वाचतांचि सौमित्र ॥ ऐकतां घनश्यामगात्र ॥
रामें धावूनि वायुपुत्र ॥ हृदयीं धरिला सप्रेमें ॥४४॥
धन्य धन्य ते अंजनी ॥ ऐसें रत्‍न प्रसवली सद्‌गुणी ॥
मारुतीचें मुख कुरवाळोनी ॥ निजासनीं राम बैसे ॥४५॥
किष्किंधेहूनी रत्‍नें आणूनि ॥ ओवाळित मारुतीवरूनि ॥
म्हणे धन्य मारुतात्मज अवतारोनी ॥ ब्रह्मांड भरलें कीर्तीनें ॥४६॥
धन्य धन्य तो दिवस ॥ स्वामी स्वमुखें गौरवी विशेष ॥
तुच्द त्यापुढें सुधारस ॥ स्वर्गभोग सर्वही ॥४७॥
असो यावरी चापपाणी ॥ हृदयीं धरी दिव्यमणी ॥
श्रीरामासी वाटलें ते क्षणीं ॥ कीं जनकजा आणिली हनुमंतें ॥४८॥
म्हणे धन्य मारुती स्नेहाळा ॥ मज भेटविली जनक बाळा ॥
तुझा प्रताप उजळला ॥ निराळमंडपि अवघाचि ॥४९॥
एवढा सागर उल्लंघूनी ॥ जानकी आलासी घेऊनी ॥
तुवां उपकारऋणेंकरूनी ॥ मज बांधिले हनुमंता ॥५०॥
हनुमंत विचारी मनीं ॥ म्यां खुण आणिली सीतेचा मणी ॥
यालागीं कोदंडपाणी ॥ आनंदला अत्यंत ॥५१॥
मज थोर चुकी घडली तेथें ॥ जरी सीताचि आणितों येथें ॥
तरी आनंदें श्रावणारिसुतें ॥ भरलें असतें ब्रह्मांड ॥५२॥
मग मनीं विचारी सीताशोकहरण ॥ आतां काय झालें बळ क्षीण ॥
न लोटतां यामार्ध पूर्ण ॥ घेऊन येईन पद्माक्षी ॥५३॥
मग म्हणे जी रघुनाथा ॥ क्षण एक धीर धरीं आतां ॥
घेऊन येतों जनकदुहिता ॥ सकळ राक्षसां निवटोनी ॥५४॥
हनुमंत करी उड्डाण ॥ सावध जाहला सीतारमण ॥
म्हणे हनुमंता न करीं गमन ॥ आहे कारण बहु पुढें ॥५५॥
आवेशें निघाला मारुती ॥ नाटोपेच तो कवणाप्रती ॥
मग स्वयें धांवूनि रघुपती ॥ आवरीत हनुमंता ॥५६॥
उचलोनियां रघुनाथ ॥ निजस्कंधीं वाहे हनुमंत ॥
म्हणे लंकेसी नेतों त्वरित ॥ रावणासी वधावया ॥५७॥
तों उर्मिलापति आणि अर्कसुत ॥ धांविन्नले अंगद जांबुवंत ॥
चौघे हनुमंतासी आवरित ॥ परी तो सर्वथा नाटोपे ॥५८॥
चौघांसही उचलून ॥ उडों पाहे सीताशोकहरण ॥
म्हणे इतुकेची लंकेसी जाऊन ॥ असुर मर्दून येऊं आतां ॥५९॥
वरकड न्यावे जरी वानर ॥ तरी ते कैसे तरतील सागर ॥
यालागीं निवडक थोर थोर ॥ पांचजण नेऊं हे ॥६०॥
पांचजणांसी उचलून ॥ स्कंधीं वाहे वायुनंदन ॥
कीं तो पंचशृंगांचा पूर्ण ॥ नगोत्तमचि शोभला ॥६१॥
कीं पंच फळें लागलीं वृक्षासी ॥ तीं जड कदा न होती तयासी ॥
कीं उदयाद्रीवरी तेजोराशी ॥ पंच सूर्य उगवले ॥६२॥
असो घेऊनि पांचजण ॥ हनुमंत करूं पाहे गमन ॥
यावरी मंगळभगिनीचा रमण ॥ हनुमंतासी विनवीतसे ॥६३॥
मारुति ऐकें प्राणसखया ॥ विचाराविणें भलती क्रिया ॥
न करावी हे कदा चर्या ॥ श्रेष्ठांची असे पूर्वीहून ॥६४॥
ऐसें विनवितां रघुनंदन ॥ मग उतरले पांचही जण ॥
जनकजापतीचे चरण ॥ सप्रेमें धरिले हनुमंतें ॥६५॥
सुग्रीव जांबुवंत नळ नीळ ॥ वर्णिती अनिळात्मजाचें बळ ॥
यावरी तो तमालनीळ ॥ सभा करूनी बैसला ॥६६॥
श्रीराम पुसे मारुतीप्रती ॥ कैसी असे लंकेसी गती ॥
राक्षस वर्तती कोणें रीतीं ॥ काय आचरती पुण्यक्रिया ॥६७॥
यावरी चार्तुयरत्‍नाकर ॥ बोले लोकप्राणेशकुमर ॥
जैसा शक्र आणि अंगिराकुमर ॥ करिती विचार एकांतीं ॥६८॥
तीनशें गांव लांब लंका ॥ रेखोनि दाविली रघुनायका ॥
सकळ सदनांचीं करून संख्या ॥ ठायीं ठायीं दाखविली ॥६९॥
जे कां मर्गज पाषाण ॥ त्यांचीं पांच लक्ष गृहें जाण ॥
सात लक्ष दैदीप्यमान ॥ विटबंदी मंदिरें ॥७०॥
ताम्र आणि कांसें निखिळ ॥ तयांची पांच कोटी सदनें निर्मळ ॥
सुवर्णांची अत्यंत सबळ ॥ सात कोटी राघवेंद्रा ॥७१॥
हेमरत्‍नीं अलंकृत ॥ नवकोटी शिवालयें तेथ ॥
रुद्राभिषेक नैवेद्य बहुत ॥ त्रिकाळ चालविती राक्षस ॥७२॥
असुरांच्या गृहीं पूर्ण ॥ अग्निहोत्र वेदाध्ययन ॥
रुद्राक्षमाळा भूषण ॥ विभूति चर्चन करिती पैं ॥७३॥
मुख्य रावणें सुबुद्धीपूर्ण ॥ टाकिलीं वेदांचीं खंडें करून ॥
तप आचरती दारुण ॥ ठायीं ठायीं राक्षस ॥७४॥
ऐसें बोलतां वायुनंदन ॥ रघुनाथ झाला उदिग्न ॥
ऐसी लंका पुण्यपरायण ॥ ते मज सर्वथा नाटोपे ॥७५॥
ऐसें जेथें सत्कर्माचरण ॥ तेथें नांदे यश कीर्ति कल्याण ॥
तरी तें होता नये लंकाभुवन ॥ बहु यत्‍न करितांही ॥७६॥
तेव्हां क्षण एक रघुनाथ ॥ निवांत न बोले चिंताक्रांत ॥
भोंवते वानर तटस्थ ॥ पाहूं लागले ते काळीं ॥७७॥
मग श्रीराम म्हणे मारुती ॥ तुवां सांगितली राक्षसांची स्थिती ॥
परी दया क्षमा उपरती ॥ शांति विरक्ति मुख्य जया ॥७८॥
शौच आणि धर्मदान ॥ असुर करिती कीं अनुदिन ॥
यावरी सीतासंतापहरण ॥ काय वचन बोलिला ॥७९॥
क्षमा दया शुद्ध अंतर ॥ शौच दान धर्म पवित्र ॥
हें लंकेमाजीं अणुमात्र ॥ सर्वथाही नसेचि ॥८०॥
परम अधर्मी निर्दय असुर ॥ कापट्यचर्या तपें क्रूर ॥
अत्यंत खळ दुराचार ॥ मद्यप्राशक उन्मत्त ते ॥८१॥
मारुती वचन ऐकुनी ॥ हास्यमुख होय चापपाणी ॥
तरी लंका घेईन ये क्षणीं ॥ पापखाणी वसती तेथें ॥८२॥
अंतरीं दया क्षमा नाहीं ॥ मग व्रतें तपें जाळिसी काई ॥
तो जरी पढला शास्त्रें साही ॥ व्यर्थ काय ते वटवट ॥८३॥
नटांमाजील कामिन ॥ कीं कोलाटियाचें शूरत्व पूर्ण ॥
कीं भ्रष्टाचें तत्वज्ञान ॥ कीं शांति पूर्ण सर्पाची ॥८४॥
कीं विधवेचें नवयौवन ॥ कीं ग्रामथिल्लरींचें जीवन ॥
कीं अनामिकाचें रम्य सदन ॥ कीं मुखमंडन वेश्येचें ॥८५॥
कीं गर्भांधाचे विशाळ नयन ॥ कीं बधिराचे शोभायमान कर्ण ॥
कीं अजाकंठींचें स्तन ॥ कीं आचरण जाराचें ॥८६॥
कीं सावचोराचे गोड बोल ॥ कीं मैंदाची शांति खोल ॥
वाटपाडे निर्मळ ॥ निरंजनीं बैसले ॥८७॥
कीं दाट लागलें कंटकवन ॥ कीं दंभिकांचें व्यर्थ भजन ॥
तैसें भूतदयेवांचून ॥ ज्ञान ध्यान व्यर्थची ॥८८॥
त्याचा एकांत व्यर्थ देख ॥ जैसे बिळीं बैसले मूषक ॥
शांति त्याची जैसा बक ॥ मत्स्यहरणार्थ बैसला ॥८९॥
भस्म अंगीं चर्चित साचार ॥ जैसा उकिरडां लोळे खर ॥
कीं अरण्यांत वसती निरंतर ॥ वृक व्याघ्र जैसे कां ॥९०॥
तेणें तीर्थीं केला वास ॥ तरी काय थोडे आहे वायस ॥
तीर्थजळीं मंडूक विशेष ॥ वटवटती विशेषें ॥९१॥
तेणें पाहिल्या चौसष्ट कळा ॥ परी तितुक्या जाणाव्या विकळा ॥
दया क्षमेचा नसतां जिव्हाळा ॥ कळा त्या विकळा जाणिजे ॥९२॥
तेणें केलें वेदाध्ययन ॥ जैसा खरावरी वाहिला चंदन ॥
षड्रसपाकीं दर्वीं पूर्ण ॥ व्यर्थ जैसी फिरूनियां ॥९३॥
त्याचे वरिवरि कीर्तन ॥ कीं गोरियाचें गायन ॥
कीं मद्यपियाचें भाषण ॥ शब्दज्ञान तेसें त्याचें ॥९४॥
जैसें वृंदावनफळ ॥ वरिवरि दिसे निर्मळ ॥
कीं धोत्राफळ रसाळ ॥ फणसासम दिसे पैं ॥९५॥
अवघा वेळ चुना मथितां ॥ परी नवनीत नये हाता ॥
सिकताहरळ शिजवतां ॥ मवाळ नव्हे कल्पांतीं ॥९६॥
तुंबिनीचें अत्यंत कडू फळ ॥ शर्करेंत ठेविल्या सर्वकाळ ॥
परी तें अंतरीं गोड होईल ॥ हें कल्पांतीं घडेना ॥९७॥
चुना माखोनि वायस ॥ बळेंचि जाहला राजहंस ॥
परी जाय विष्ठा शोधावयास ॥ व्यर्थ वेष कासया ॥९८॥
यालागीं ऐक हनुमंता ॥ दया क्षमा हृदयीं नसतां ॥
जप तप ध्यान तत्वतां ॥ व्यर्थ गेलें निर्धारें ॥९९॥
तरी ते लंकावासी असुर ॥ करीन अवघ्यांचा संहार ॥
ऐकतां आनंदले वानर ॥ देती भुभुःकार एकदांचि ॥१००॥
असो ब्रह्मपत्र मागें वाचिलें ॥ तें विरिंचीनें होतें लिहिलें ॥
हनुमंतें लंकादहन केलें ॥ परी नगर झालें सुवर्णाचें ॥१॥
ते ऐकोनियां मात ॥ आश्चर्य करी कौसल्यासुत ॥
मग जांबुवंतासी पुसत ॥ हा वृत्तांत कैसा असे ॥२॥
तूं बहुकाळाचा पुरुष ॥ देखिलें ऐकिलें बहुवस ॥
तो ब्रह्मयाचा अंश ॥ अयोध्याधीश म्हणोनि पुसे ॥३॥
वयें गुण तपें बहुत ॥ वडील असे जांबुवंत ॥
सांगे पूर्वीचा वृत्तांत ॥ जैं लंका नगर वसत पैं ॥४॥
जें केलें गजेंद्रोद्धारण ॥ वेगें परतला रमारमण ॥
तों कर जोडूनि सुपर्ण ॥ क्षुधेनें बहु व्यापिला ॥५॥
मग बोले श्रीकरधर ॥ गजेंद्रनक्रांची कलेवरें थोर ॥
तीं भक्षून येई सत्वर ॥ ऐकोनि पक्षींद्र उडाला ॥६॥
नक्रगजेंद्रांचीं कलेवरें दोनी ॥ उरगारि घेऊन उडे गगनीं ॥
तों भृभंग पक्षी येऊनी ॥ विभाग मागे खगेंद्रा ॥७॥
गरुडें न लागतां एक क्षण ॥ भृभंगाचा घेतला प्राण ॥
जंबूवृक्षाची शाखा पाहून ॥ वैनतेय बैसला ॥८॥
तों साठिसहस्र वालखिल्यें ॥ तिहीं त्या शाखेसि टांगून घेतलें ॥
अरुणानुजें बळ तुळिलें ॥ तों शाखा विशाळ मोडली ॥९॥
शतयोजनें शाखा थोर ॥ पडतां मृत्यु पावतील विप्र ॥
शाखा हातीं मुखीं गजनक्र ॥ कश्यपसुत उडाला ॥११०॥
मग बोले विष्णुवहन ॥ म्हणे मी कोणास जाऊं शरण ॥
शाखा सोडितां ब्राह्मण ॥ साठ सहस्र मरतील ॥११॥
कश्यप बैसला अनुष्ठानीं ॥ त्यावरी पक्षें छाया धरिली गगनीं ॥
तों वरुतें पाहे विलोकुनी ॥ तंव सुत संकटीं पडियेला ॥१२॥
तेव्हां कश्यप ऋषीनें प्रार्थून ॥ खालीं उतरविले ब्राह्मण ॥
मग कश्यप म्हणे पुत्रालागून ॥ शाखा येथें न ठेवीं ॥१३॥
या शाखेकारणें पूर्ण ॥ मानव घेतील एकमेकांचा प्राण ॥
मग विहंगोत्तमें शाखा उचलून ॥ लंकागिरी वरी आला ॥१४॥
तिवडा पाय त्याचा रुतला ॥ तोच हा त्रिकूटाचल जाहला ॥
गरुडें आहार तेथें घेतला ॥ टाकूनि गेला शाखा तेथें ॥१५॥
त्यावरी मग लंका वसिन्नली ॥ ते सुवर्ण शाखा असे तळीं ॥
हनुमंतें लंका जाळिली ॥ मूस ओतली शाखेसी ॥१६॥
यालागीं सुवर्णाची लंका ॥ जाहली जाण अयोध्यानायका ॥
तों अर्कज म्हणे मुहूर्त निका ॥ ये समयीं असे पैं ॥१७॥
विजयादशमी नक्षत्र श्रवण ॥ ते दिवशीं निघाला रघुनंदन ॥
पूर्वी रघूनें हाचि मुहूर्त पाहून ॥ दिग्विजयासी गेला होता ॥१८॥
सर्व शुभ योग ते क्षणीं ॥ जयातिथि माळ घेऊनि ॥
दशकंठरिपूचे चरणीं ॥ मिठी घाली तेधवां ॥१९॥
साह्य सुग्रीव किष्किंधेश्वर ॥ उठले अठरा पद्में वानर ॥
बहात्तर कोटी रीस वीर ॥ त्यांचा नृपवर जांबुवंत ॥१२०॥
छप्पन्न कोटी गोलांगूळ ॥ भुभुःकार देती एकचि वेळ ॥
दणाणिलें उर्वीमंडळ ॥ धाकें निराळ कांपतसे ॥२१॥
काद्रवेयकुळभूषण तेव्हां ॥ सरसावित खालतीं ग्रीवा ॥
यज्ञवराहें दंत बरवा ॥ दृढ धरिला उचलोनी ॥२२॥
कूर्म पृष्ठी सरसावित ॥ दिग्गज जाहले भयभीत ॥
मंगळजननी कांपत ॥ भुभुःकार कानीं ऐकतां ॥२३॥
वनचर आणि खेचर ॥ भयभीत जाहले थोर ॥
धडके वाद्यांचा गजर ॥ नादें अंबर कोंदलें ॥२४॥
रथारूढ जैसा सहस्रकर ॥ कीं सौपर्ण श्रीकरधर ॥
हनुमंतस्कंधीं रघुवीर ॥ तैसा शोभला ते काळीं ॥२५॥
नंदीवरी बैसे कर्पूरगौर ॥ कीं ऐरावतारूढ सहस्रनेत्र ॥
अंगदस्कंधावरी सौमित्र ॥ त्याचपरी शोभला ॥२६॥
किरणचक्रीं विराजे तमारी ॥ कीं कुळाचळांमाजी कनकाद्री ॥
कीं निजगणांमाजी स्मरारी ॥ तैसा वानरीं राम वेष्ठिला ॥२७॥
कीं मंथावया क्षीरसागर ॥ मिळोनि निघाले सुरासुर ॥
तैसेच गर्जत वानर ॥ दक्षिणपंथें चालिले ॥२८॥
विशाळ वृक्ष उपडिती ॥ छत्र रामावरी धरिती ॥
वृक्ष पल्लव घेऊन हातीं ॥ चवरें विराजती रामावरी ॥२९॥
दशयोजन रुंद सेना जातां ॥ मार्गीं वानर म्हणती रघुनाथा ॥
आजी रावणा घालूं पालथा ॥ जनकदुहिता भेटवूं तुम्हां ॥१३०॥
एक बोले वानर वीर ॥ मी जाऊन मारीन दशवक्र ॥
एक वेद न लागतां क्षणमात्र ॥ मोट बांधून आणीन ॥३१॥
एक म्हणे स्वामी रघुनंदना ॥ ऐसें वाटतें माझिया मना ॥
रावणाच्या नासिकां कर्णां ॥ छेदून येईन झडकरी ॥३२॥
एक म्हणे एकलाचि जाईन ॥ लंका पालथी घालीन ॥
एकोनि सुखावे रघुनंदन ॥ म्हणे हे सुरगण अवतरले ॥३३॥
दक्षिणपंथे भार जात ॥ मार्गी कपि उचलिती पर्वत ॥
कंदुका ऐसे झेलित ॥ धांवताती आवेशें ॥३४॥
समुद्रतीरास आले भार ॥ भुभुःकार देती वानर ॥
तेणें भयभीत नदीश्वर ॥ जाहला परम ते काळीं ॥३५॥
जैसा वेद बोलत गेला अद्‌भत ॥ स्वरूप देखोनि जाहला तटस्थ ॥
तैसे वानरवीर समस्त ॥ समुद्रतीरीं स्थिरावले ॥३६॥
कीं राजहंसांच्या येऊन हारी ॥ स्थिरावती मानससरोवरीं ॥
तैसे ते समुद्रतीरीं ॥ कपि-केसरी तटस्थ ॥३७॥
दशयोजनें अद्‌भुत ॥ सेना उतरली ओतप्रोत ॥
असो लंकेमाजी वृत्तांत ॥ वर्तला तोचि परिसावा ॥३८॥
कपिसहित अयोध्याविहारी ॥ पातला सागराचे पैल तीरीं ॥
ऐसी ध्वनी लंकेमाझारी ॥ राक्षसेंद्रें आकर्णिली ॥३९॥
शक्रजितादि सकळ कुमर ॥ प्रहस्तादि प्रधान थोर थोर ॥
त्यांसहित विंशतिनेत्र ॥ बैसे विचार करावया ॥१४०॥
परम सचिंत द्विपंचवदन ॥ म्हणे शत्रु दंदशूक कृशान ॥
हे सर्वथा न म्हणावे लहान ॥ न लागतां क्षण विघ्न करिती ॥४१॥
तरी सहपरिवारें येऊन ॥ परतीरीं उतरला रघुनंदन ॥
हा आकळे ऐसा मंत्र कोण ॥ विचारूनि सांगा आतां ॥४२॥
एकला येऊन वानर ॥ जाळून गेला लंकानगर ॥
शुद्धि सांगोनि रामचंद्र ॥ घेऊन आला वेगेंसी ॥४३॥
ऐसें बोलतां द्विपंचवदन ॥ सकळ कुमर आणि प्रधान ॥
जाहले परम क्रोधायमान ॥ शस्त्रें तुळोनि बोलती ॥४४॥
ते नर वानर आणि ऋक्ष ॥ सहज आले आमुचे भक्ष ॥
कृपाळु आम्हांवरी विरूपाक्ष ॥ तेणेंच धाडोनि दीधले ॥४५॥
तुम्हीं चिंता न करावी साचार ॥ तुमचे शत्रूचा करूं संहार ॥
आम्ही येऊं न लागतां क्षणमात्र ॥ म्हणोनि शस्त्रें झाडिती ॥४६॥
शक्रजित अतिकायादि कुमर ॥ देवांतक नरांतक महोदर ॥
धूमा्रक्ष वज्रदंष्ट्री असुर ॥ म्हणती नर वानर क्षणें जिंकूं ॥४७॥
दूर असतां मृगनायक ॥ मागें निंदा जल्पती जंबुक ॥
कीं मिळोनि बहुत मंडूक ॥ वासुकीसी जिंकूं म्हणती ॥४८॥
तंव ते सभेमाजी बिभीषण ॥ येता झाला सभा देखोन ॥
जैसा वायस सभेंत येऊन ॥ राजहंस बैसला ॥४९॥
जो विवेकरत्‍नांचा किरीट ॥ कीं सद्‌गुणगंगेचा लोट ॥
कीं भाववैरागरींचा सुभट ॥ दिव्य हिरा प्रकाशला ॥१५०॥
विवेकभूमीचें निधान ॥ कीं भक्तिसमुद्राचें भरतें पूर्ण ॥
कीं ते परमार्थवनींचें सुमन ॥ अम्लान सुंदर विकासलें ॥५१॥
असो ऐसा बिभीषण थोर ॥ न्यायसिंधु सत्यसमुद्र ॥
सकळ खळांसी प्रत्युत्तर ॥ देता जाहला ते वेळे ॥५२॥
म्हणे वाचाळ तुम्ही परम दुर्जन ॥ महाकपटी अंतरमलिन ॥
दशमुखाभोंवतें मिळोन ॥ नानाकुतर्क करीतसां ॥५३॥
यश धैर्य सकळ सद्‌गुण ॥ सभाग्याची करणी ऐकोन ॥
परम खेद मानिती दुर्जन ॥ नसतें दूषण लाविती ॥५४॥
परम कुमति जो बळहीन ॥ मागें निंदा जल्पे रात्रंदिन ॥
समरभूमीसी पळे उठोन ॥ हे तों लक्ष्मण श्वानाचें ॥५५॥
सकळ दळासमवेत ॥ जिंकू म्हणतां अयोध्यानाथ ॥
तरी येथें एकलाचि हनुमंत ॥ आला होता निजबळें ॥५६॥
जैसें करतळींचें आचमन ॥ कीं गोवत्सपदींचें जीवन ॥
तैसा ज्याचे दृष्टी समुद्र पूर्ण ॥ लंघोनि क्षणें आला तो ॥५७॥
तेणें विध्वंसिलें सकळ नगर ॥ रावणसभा नागविली समग्र ॥
कोट्यानकोटी निशाचर ॥ अशोकवनीं संहारिले ॥५८॥
राजसुत मारिले समस्त ॥ विवरीं कोंडिला शक्रजित ॥
लंका जाळून अद्‌भुत ॥ पुरुषार्थ तेणें दाविला ॥५९॥
ते वेळे तुमचें बळ ॥ काय जाहले होतें विकळ ॥
आतां रावणाभोंवते सकळ ॥ पुरुषार्थ सांगतां ॥१६०॥
नाना पाखंडी दुर्जन यवन ॥ इहीं वेदांसी ठेविलें दूषण ॥
परी वंदिती कीं विद्वज्जन ॥ ज्ञानसंपन्न धर्मात्मे ॥६१॥
कमळासी निंदिती दर्दुर ॥ परी सहसा न विटेचि भ्रमर ॥
चंद्रासी निंदिती तस्कर ॥ परी ते चकोर आनंदती ॥६२॥
खळ ते निंदती पंडित ॥ परी कुशल वंदिती समस्त ॥
वायस मुक्तें वोसंडित ॥ परी मराळ न वीटती ॥६३॥
मूढासी न कळे कस्तुरी ॥ पंक म्हणोनि टाकिती दूरी ॥
परी श्रीमंत अहोरात्री ॥ हृदयीं शिरी धरिताती ॥६४॥
दिवाभीता नावडे अर्क ॥ परी आनंदती चक्रवाक ॥
अंधें टाकिलें रत्‍न ॥ सुरेख ॥ परी परिक्षक संरक्षिती ॥६५॥
तैसा जगद्वंद्य रघुवीर ॥ जयासी हृदयीं ध्याय उमावर ॥
कमलोद्‌भव सहस्रनेत्र ॥ सहस्रवक्र स्तवी जया ॥६६॥
सनकादिक हृदयीं ध्याती ॥ जो वेद उदयाचळींचा गभस्ती ॥
तो हा पुराणपुरुष आला व्यक्ती ॥ मूळप्रकृतीसमवेत ॥६७॥
ब्रह्मांडनगरस्तंभ अद्‌भुत ॥ मायाचक्रचाळक शाश्वत ॥
दशरथाचा पुण्यपर्वत ॥ श्रीरामरूपें प्रगटला ॥६८॥
तैसा वेदवंद्य रघुवीर ॥ त्यासी तुम्ही निंदितां पामर ॥
रावणासी झोंबला कामविखार ॥ भुलला साचार म्हणोनी ॥६९॥
कार्तवीर्याचे बंदी जाऊन ॥ पडिला होता द्विपंचवदन ॥
परम पुरुषार्थी सहस्रार्जुन ॥ भृगुनंदनें वधिलें त्यासी ॥१७०॥
जो क्षत्रियांतक प्रळयरुद्र ॥ त्यास जिंकी हा रामचंद्र ॥
मतिहीन झाला विंशतिनेत्र ॥ नोळखे स्वरूप तयाचें ॥७१॥
वनचर न होती द्रुमपाणी ॥ अवघे अवतरले सुधापानी ॥
अजून तरी हें मनीं जाणोनी ॥ जानकी द्वावी रामचंद्रा ॥७२॥
चंड कोदंड अद्‌भुत ॥ रावणासी नुचले जड बहुत ॥
तें दुखंड करी रघुनाथ ॥ सकळ रायांदेखतां ॥७३॥
यालागीं सागरपैलापारीं ॥ रामचंद्र जों आहे दूरी ॥
तों मंगळजननीची कुमरी ॥ राघवेंद्रा समर्पावी ॥७४॥
ऊर्मिलाजीवनाची चापरेखा ॥ नुलंघवेचि तुज दशमुखा ॥
यालागीं त्रिभुवननायका ॥ जानकी नेऊन भेटवीं ॥७५॥
जानकीस भेटवी रघुनंदन ॥ बंदींचे सोडवी सुरगण ॥
मग चंद्रार्कवरी कल्याण ॥ पुत्रपौत्रीं नांदसी ॥७६॥
माझीं वचनें वाटती कठीण ॥ परी पुढें गोड अमृताहून ॥
औषध आधीं कटुवट पूर्ण ॥ परी रोगहरण पुढें करी ॥७७॥
गोड अत्यंत नाबदी साखर ॥ मुखीं घालितां कडकड फार ॥
परी गोडी ते अपार ॥ तैसीं साचार वचनें माझीं ॥७८॥
तुरट वाटे आमलक ॥ परी पुढें गोडी दे अधिक ॥
तैसीं माझीं वचनें दुःखमोचक ॥ हृदयीं धरी दशकंधरा ॥७९॥
पिता पढवी पुत्रालागून ॥ त्यास वाटे विषासमान ॥
परी पुढें गोड सुधेहून ॥ महिमा पूर्ण वाढे जेव्हां ॥१८०॥
अशुभ चिन्हें अत्यंत ॥ लंकेमाजी होती बहुत ॥
क्षणक्षणां उल्कापात ॥ नभ थरथरतें वाटतसे ॥८१॥
जलदजाळ नसे किंचित ॥ रुधिरधारा मेघ वर्षत ॥
दुष्ट स्वप्नें अत्यंत ॥ मंदोदरीस जाणविती ॥८२॥
विगतधवा स्त्रिया येऊन ॥ ओटी भरिती मृत्तिका घेऊन ॥
मंगळसूत्र तोडून ॥ कृष्णवस्त्रपुरुष नेतसे ॥८३॥
यालागीं दशवदना तूं सज्ञान ॥ टाकिलीं वेदांचीं खंडें करून ॥
तरी जाणत जाणतां कृशान ॥ पदरीं कैसा बांधिसी ॥८४॥
समजोनिया विष दारुण ॥ कां करावें बळें प्राशन ॥
दंदशूक ओळखून ॥ मग कां उशीं करावा ॥८५॥
खदिरांगार जाणोन ॥ मग कां वरी करावें शयन ॥
उदरीं पाषाण बांधोन ॥ महाडोहीं कां निघावें ॥८६॥
ऐसें बोलतां बिभीषण ॥ तटस्थ जाहले सभाजन ॥
क्रोधें व्याप्त रावण ॥ मौन धरून उगाचि ॥८७॥
बिभीषणासी म्हणे प्रहस्त ॥ उगेच बैसा हो निश्चित ॥
सभेंत बोलतां अनुचित ॥ मृत्यु पावाल निर्धारें ॥८८॥
तुम्ही राजबंधु म्हणवितां जाण ॥ परी शतमूर्खाहूनि बुद्धिहीन ॥
तुम्हांस नाहीं चातुर्यज्ञान ॥ तरी उठोन गृहा जावें ॥८९॥
सक्रोधें बोलें इंद्रजित ॥ तूं अनुचित बोललासी सभेंत ॥
तुज आतांचि वधितों यथार्थ ॥ परी पितृव्य म्हणोनि शंकलों ॥१९०॥
शक्रजित म्हणे दशमुखा ॥ हा तुमचा बंधु सखा ॥
परी हा शत्रुचा पक्षपाती देखा ॥ अनर्थकारक दिसतसे ॥९१॥
बिभीषण म्हणे तूं चांडाळ ॥ महाकपटी कृतघ्न खळ ॥
तुमचे संगतीनें भूपाळ ॥ मतिमंद जाहला ॥९२॥
अंकुशें आकर्षिजे वारण ॥ भुजंग आकळिजे मंत्रेंकरून ॥
राजमती आकळिती प्रधान ॥ परम सज्ञान चतुर जे ॥९३॥
माजला अत्यंत कृशान ॥ तो विझविजे जळेंकरून ॥
कीं क्रोधोर्मी अति दारुण ॥ सद्विवेकें आकर्षिजे ॥९४॥
नृपें करितां अनुचित करणी ॥ तत्काळ आवरिजे प्रधानीं ॥
परी तुम्ही अवघे पापखाणी ॥ निर्दय आणि कृतघ्न ॥९५॥
राजा आधींच अत्यंत खळ ॥ प्रधान मिळाला अमंगळ ॥
मग अविवेक वाढे प्रबळ ॥ कुबुद्धिकल्लोळ उठती पैं ॥९६॥
शंख करावयाची हौस गहन ॥ त्यांत पातला मास फाल्गुन ॥
कीं स्त्रीराज्यांतील पारिपत्य पूर्ण ॥ जारासी प्राप्त जाहलें ॥९७॥
आधींच चाहाड तस्कर ॥ त्यावरी पाठिराखा नृपवर ॥
कीं उन्मत्तासी सरोवर ॥ प्राप्त जाहलें मद्याचें ॥९८॥
तैसा कुबुद्धीनें वेष्टिला दशवदन ॥ तैसेंच तुम्ही मिळालां प्रधान ॥
जैसे वृकाचे सदनीं श्वान ॥ कारभारी जाहलें ॥९९॥
अरे तुझें मरण आलें जवळी ॥ म्हणोनि आणिली जनकबाळी ॥
अयोध्याप्रभु प्रतापबळी ॥ आला निकट काळ तुझा ॥२००॥
रावणें अनुचित कर्म मांडिलें ॥ म्हणोनि मातेनें मज प्रेरिलें ॥
यालागीं तुम्हांतें बोलिले ॥ मनीं धराल म्हणोनी ॥१॥
परी होणार बळिवंत ॥ तुम्ही नायकाचि उन्मत्त ॥
सीता न द्याल तरी निश्चित ॥ कुळक्षय होईल तुमचा ॥२॥
ऐसें ऐकतां रावण ॥ क्रोधें व्यापिला परिपूर्ण ॥
बिभीषणावरी शस्त्र घेऊन ॥ परम आवेशें धांविन्नला ॥३॥
बिभीषण केवळ परम भक्त ॥ तयासी रक्षिता रघुनाथ ॥
तो रावणाचा उपटला हात ॥ शस्त्र पडलें धरेवरी ॥४॥
मागुता धांवे रावण ॥ इंद्रजितें धरिला आवरून ॥
मग झाडिला वाम चरण ॥ तो लागला बिभीषणासी ॥५॥
बिभीषण केवळ शांत ॥ निर्मत्सर भेदरहित ॥
रावणासी मागुती म्हणत ॥ सखा रघुनाथ करीं कां रे ॥६॥
बिभीषण क्षमाशील पूर्ण ॥ वानिती सकळ राक्षसगण ॥
तो माता कैकसी येऊन ॥ सांगें हित बिभीषणा ॥७॥
म्हणे पुत्रासी तूं ऊठ आतां ॥ शरण जाईं रघुनाथा ॥
जो वज्रपंजर शरणागता ॥ भवव्यथा वारील तो ॥८॥
माझे उदरा आलासी साचार ॥ करीं माझा उद्धार ॥
तनुमनधनेंसी सत्वर ॥ शरण जाईं रघुवीरा ॥९॥
सांडोनि सकळ मायाचिंता ॥ शरण जावें जानकीनाथा ॥
रावणें क्षय केला तत्वतां ॥ तूं जाय परता येथूनी ॥२१०॥
जे बळेंचि विष भक्षिती ॥ शहाणे न बैसती त्यांचे पंक्ती ॥
तरी तूं सखा करी रघुपती ॥ नाश कल्पांतीं नव्हे तूंतें ॥११॥
ऐकोनि मातेचें वचन ॥ बिभीषणें केलें साष्टांग नमन ॥
घेऊनि चौघेजण प्रधान ॥ उभा ठाकला ते काळीं ॥१२॥
रावणासी म्हणे बिभीषण ॥ मी श्रीरामासी जातो शरण ॥
तूं ज्येष्ठबंधु म्हणोन ॥ पुसतों तुज मागुती ॥१३॥
ऐसें बोलोनि त्वरित ॥ बिभीषण उडाला अकस्मात ॥
चौघां प्रधानांसमवेत ॥ सर्वांदेखतां ते काळीं ॥१४॥
जैसें कलेवर सांडून ॥ एकदांच निघती पंचप्राण ॥
कीं पांचही दिवाकर मिळोन ॥ अस्ताचळावरी चालिले ॥१५॥
कीं कल्पांतीं पंचमहाभूतें ॥ जाती स्वरूपास मिळावयातें ॥
तैसे शरण जनकजापतीतें ॥ पांचही जाती त्वरेंनें ॥१६॥
श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ हाचि केवळ रामेश्वर ॥
आवडीच्या कावडी भरोनि सत्वर ॥ सभक्त नर धांवती ॥१७॥
भाव प्रयागींचें प्रेमोदक ॥ जे या रामेश्वरावरी करिती अभिषेक ॥
त्यांचे मनोरथ अयोध्यानायक ॥ सत्य परिपूर्ण करील ॥१८॥
अयोध्याधीशा ब्रह्मानंदा ॥ श्रीधरवरदा वेदवंद्या ॥
छेदोनियां अविद्याभेदा ॥ अभंग पदा देशी कीं ॥१९॥
स्वस्तिश्री रामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिक नाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वाविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२२०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय तेविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दुर्धर अहंकार दशानन ॥ अहंदेहबुद्धि लंका गहन ॥
तेथे वास्तव्य अनुदिन ॥ क्रोध कुंभकर्ण बंधु सखा ॥१॥
अनर्थकारक काम इंद्रजित ॥ मद हा मुख्य प्रधान प्रहस्त ॥
मत्सर दंभ ते निश्चित ॥ देवांतक नरांतक पैं ॥२॥
शोक मोह आणि अनर्थ ॥ भेदवादी असुर बहुत ॥
खळ कुटिल कुतर्क समस्त ॥ देह लंकेत दुमदुमती ॥३॥
यांचे बळे माजोनि रावण ॥ बंदी घातले सुरगण ॥
आदिदैवत अध्यात्म होऊन ॥ देहलंकेत बंदी पडिले ॥४॥
रमेश तो अंतःकरण ॥ रमाबंधु तोचि मन ॥
बुद्धि विरिंची चित्त नारायण ॥ रावणें बंदी घातली ॥५॥
चक्षुंच्या ठायीं सूर्यनारायण ॥ रसना ते रसनायक वरुण ॥
अश्विनौदेव दोघे घ्राण ॥ रावणें बंदी घातले ॥६॥
वाचा केवळ वैश्वानर ॥ पाणी ते जाण पुरंदर ॥
असो देव आकळोनि समग्र ॥ सेवक करूनि रक्षिले ॥७॥
मायामृग छेदावया लागून ॥ निरंजनी प्रवेशे रघुनंदन ॥
कापट्यशब्द उठवून ॥ विवेक लक्ष्मण दवडिला ॥८॥
सद्बुद्धि जानकीचे हरण ॥ अहंकारें केले न लागतां क्षण ॥
अहंदेह लंकेत आणून ॥ दुराचारें कोंडिलें ॥९॥
मग धांविन्नला वैराग्य हनुमंत ॥ तेणें देहलंका जाळूनि समस्त ॥
कामक्रोधादि राक्षसांसहित ॥ अहं लंकानाथ गांजिला ॥१०॥
सद्बुद्धीचे करूनि समाधान ॥ घेऊन आला रघुनंदन ॥
तो केवळ सद्‌भाव बिभीषण ॥ रावणें त्रासिला सभास्थानी ॥११॥
आत्माराम सद्‌गुरु पूर्ण ॥ त्यास शरण चालिला बिभीषण ॥
बाविसावे अध्यायीं जाण ॥ हेंचि कथन सांगितलें ॥१२॥
देखोनि वायसांचा मेळ ॥ त्रासोनि निघे मराळ ॥
कीं देखानि दुष्ट निंदक खळ ॥ साधु उठे तेथोनियां ॥१३॥
तैसा प्रधानांसह बिभीषण ॥ ऊर्ध्वपंथे क्रमीत गगन ॥
भवसिंधु उल्लंघोनि चरण ॥ गुणसिंधूचे पाहूं इच्छी ॥१४॥
हिरण्यकशिपें गांजिला प्रल्हाद ॥ तेणें हृदयी धरिला मुकुंद ॥
तैसाचि जानकीहृदयमिलिंद ॥ बिभीषणें जवळी केला पै ॥१५॥
वानर अंतरिक्ष विलोकिती ॥ तों पाचही असुर उतरले क्षितीं ॥
सेनाप्रदेशीं उभे राहती ॥ हस्त जोडूनि तेधवां ॥१६॥
कित्येक धांवले वानरगण ॥ घेऊनियां वृक्षपाषाण ॥
तो बिभीषण म्हणे मी तुम्हांसी शरण ॥ दावा चरण रघुपतीचे ॥१७॥
रावणबंधू मी बिभीषण ॥ तेणें अपमानिले मजलागून ॥
आलो सीतावल्लभासी शरण ॥ त्याचे चरण दावा मज ॥१८॥
जे सेनादिकांची ध्येय मूर्ति ॥ नारदादि गाती ज्याची कीर्ति ॥
तो ब्रह्मानंद अयोध्यापती ॥ त्याचे चरण मज दावा ॥१९॥
जें निगमवल्लीचे पक्व फळ पूर्ण ॥ जो विषकंठमनमांदुसरत्‍न ॥
जे पद्मोद्‌भवाचें देवतार्चन ॥ त्याचे चरण दावा मज ॥२०॥
प्रतापमित्र रघुनंदन ॥ जो अरिचक्रवारणपंचानन ॥
जो खरदूषणप्राणहरण ॥ त्याचे चरण दावा मज ॥२१॥
वेदांती म्हणती परब्रह्म ॥ अजअजित पूर्णकाम ॥
तोचि हा दशरथात्मज श्रीराम ॥ त्याचे चरण दावा मज ॥२२॥
व्याकरणकार शब्द साधिती ॥ त्याचे नामाचे अनेकार्थ्ज्ञ करिती ॥
तोचि हा मंगळभगिनीचा पति ॥ त्याचे चरण दावा मज ॥२३॥
पातंजली योग साधून ॥ योग पावती निरंजन ॥
तोचि हा चंडकिरणकुळभूषण ॥ त्याचे चरण दावा मज ॥२४॥
प्रकृति पुरुष सांगत ॥ सांख्यशास्त्र असे गर्जत ॥
तोचि हा जानकीनाथ ॥ त्याचे चरण दावा मज ॥२५॥
नैयायिक म्हणती कर्ता ईश्वर ॥ जीवासी न कळे त्याचा पार ॥
तोचि हा अजराजपुत्रकुमर ॥ त्याचे चरण दावा मज ॥२६॥
मीमांसक स्थापिती कर्म ॥ कर्माचरणें पाविजे परब्रह्म ॥
तो परात्पर विश्रांतिधाम ॥ त्याचे चरण दावा मज ॥२७॥
ऐशीं बिभीषणाचीं शब्दरत्‍नें ॥ की ती भक्तिनभींचीं उडुगणें ॥
की तीं वैराग्यवल्लीची सुमने ॥ प्रेमसुवासें विकासती ॥२८॥
श्रीरामसुग्रीवांसी जाऊन ॥ कित्येक सांगती वर्तमान ॥
चौघे प्रधानांसह शरण ॥ राक्षस एक आलासे ॥२९॥
आपला ज्येष्ठ बंधु रावण ॥ आपुलें नाम सांगे बिभीषण ॥
ऐसें ऐकतां जानकीजीवन ॥ सुग्रीवाकडे पाहत ॥३०॥
तो अर्कज बोले उत्तर ॥ वरी भाविक दिसतो निशाचर ॥
परी नोळखतां तयाचे अंतर ॥ जवळी सहसा ठेवूं नये ॥३१॥
दिवाभीताची सेवा करून ॥ कागे लाविला जैसा अग्न ॥
तैसा जरी गेला करून ॥ तरी मग काय विचार ॥३२॥
जांबुवंत म्हणे मारूनि वाळी ॥ किष्किंधा तुम्ही सुग्रीवा दिधली ॥
हे कीर्ति ऐकोनि तात्काळीं ॥ शरण आला तुम्हांतें ॥३३॥
मारूनियां रावणा ॥ लंकाराज्य द्यावे आपणा ॥
हेचि मनी धरूनि वासना ॥ शरण आला तुम्हांते ॥३४॥
सुषेण म्हणे समयी कठीण ॥ देखोन साह्य करिती बंधुजन ॥
हा रावणासी सोडून आला शरण ॥ हेंचि नवल वाटतें ॥३५॥
तर्क वितर्क बहु विचार ॥ करिते झाले तेव्हां वानर ॥
मग तो शेवटी रुद्रावतार ॥ निश्चयवचन बोलिला ॥३६॥
लंकेत शोधितां जनककुमारी ॥ मी प्रवेशलों याचे मंदिरीं ॥
महासाधु निष्कपट अंतरीं ॥ तेच समयी ओळखिला ॥३७॥
वरी तुम्हांस दिसतो राक्षस ॥ परी अंतरीं प्रेमळ निर्दोष ॥
कंटकमय दिसतो फणस ॥ परी अंतरीं सुरस जैसा ॥३८॥
शरणागतांसी वज्रपंजर ॥ रामा तुझें ब्रीद साचार ॥
जवळी बोलावून असुर ॥ अभय तयातें देइंजे ॥३९॥
इतर शास्त्रीचें बोल बहुत ॥ एक वचनें दावी वेदांत ॥
तैसें बोलिला हनुमंत ॥ तेंच समस्तां मानलें ॥४०॥
अंगदासी भ्रूसंकेत ॥ दावीत तेव्हां ताराकांत ॥
बिभीषणास आणावया त्वरित ॥ येरू निघाला वायुवेगें ॥४१॥
बिभीषणास म्हणे वाळीपुत्र ॥ उदेला तुझा भाग्यमित्र ॥
तुज पाचारितो स्मरारिमित्र ॥ राजीवनेत्र अजित जो ॥४२॥
बिभीषणाचा धरूनि हस्त ॥ रामाजवळी आला तारासुत ॥
जेंवि साधकासी सद्विवेक दावित ॥ स्वरूपनिर्धार निश्चयें ॥४३॥
असो बिभीषणं पाहिला श्रीराम ॥ जो चरचरफलांकित द्रुम ॥
जयजयकार करून परम लोटांगण घातलें ॥४४॥
दृष्टीं पाहूनि श्रीरामचंद्र ॥ उचंबळे बिभीषणभाव समुद्र ॥
प्रेमाचें भरते अपार ॥ दाटतें झालें तेधवां ॥४५॥
श्रीरामचरणारविंदसुगंध ॥ तेथें बिभीषण जाहला मिलिंद ॥
अष्टभावें होऊन सद्रद ॥ आनंदमय जाहला ॥४६॥
रामचरणीं ठेवितां मस्तक ॥ संतोषोनि ब्रह्मांडनायक ॥
शिरी ठेविला वरद हस्त ॥ अक्षय कल्याणदायक जो ॥४७॥
म्हणे जोंवरी शशी आणि तरणी ॥ जोंवरी रामकथा आणि धरणी ॥
तोंवरी राज्य करी लंकाभुवनीं ॥ बळीध्रुवांसारिखें ॥४८॥
जेंवी चिरंजीव वायुनंदन ॥ त्याचपरी राहें तूं बिभीषण ॥
काळीकाळ तोडरीं बांधोन ॥ लंकेत सुखें नांदे कां ॥४९॥
ऐसा आशीर्वाद देऊन ॥ रामें उठविलां बिभीषण ॥
सप्रेमें दिधलें आलिंगन ॥ वानरगण आनंदले ॥५०॥
मग सौमित्र आणि अष्ट दिक्पती ॥ तेही बिभीषणासी भेटती ॥
पुष्पवर्षाव करिती ॥ वृंदारक तेधवां ॥५१॥
मग बिभीषण जोडूनि कर ॥ उभा राहिला श्रीरामासमोर ॥
म्हणे जयजय राम करुणासमुद्र ॥ जगदोद्धारा दीनबंधो ॥५२॥
जयजय रामकमळपत्राक्षा ॥ हे ताटिकांतका सर्वसाक्षा ॥
मखपाळका निर्विकल्पवृक्षा ॥ कर्माध्यक्षा कर्ममोचका ॥५३॥
जय राम चंडीशकोदंडभंजना ॥ हे राम दशकंठदर्पहरणा ॥
हे राम विषकंठदाहशमना ॥ भक्तरंजना जगवंद्या ॥५४॥
हे राम पद्मजातजनका ॥ हे राम विबुधबंधच्छेदका ॥
हे राम दुष्टअसुरांतका ॥ सहस्रमुखा न वर्णवेचि ॥५५॥
ऐसी बिभीषणें करितां स्तुति ॥ मग तयासी हाती धरूनि सीतापति ॥
आपणजवळी बैसवी प्रीतीं ॥ बहुत मान देऊनियां ॥५६॥
संतोषोनि बोले रघुनंदन ॥ आमचा पांचवा बंधु बिभीषण ॥
वानर म्हणती धन्य धन्य ॥ भाग्यरावणानुजाचें ॥५७॥
मग चतुःसमुद्रींचीं उदकें आणुनी ॥ बिभीषणासी रामें बैसवूनी ॥
लंकापति हा म्हणूनि ॥ अभिषेक केला यथाविधी ॥५८॥
लंकानगरींचा नृप पूर्ण ॥ येथून अक्षयी बिभीषण ॥
यावरी लोकप्राणेशनंदन ॥ काय करिता जाहला ॥५९॥
वाळूची लंका विशाळ केली ॥ कपींचीं किराणें बाहेर पडली ॥
ते बिभीषणाजवळी गहाण ठेविली ॥ राघवेंद्र तेधवां ॥६०॥
माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ॥ ते लंका सांडीन ओंवाळून ॥
परम प्रीतीं सीताजीवन ॥ लंका विलोकी मारुतीची ॥६१॥
असो यावरी बिभिषणाप्रति ॥ विचारीत जनकजापती ॥
म्हणे सागर तरावया निश्चितीं ॥ काय उपाय करावा ॥६२॥
यावरी बोले बिभीषण ॥ सागराची पूजा करून ॥
मागावा मार्ग प्रार्थून ॥ वानरदळ उतरावया ॥६३॥
मग समुद्रतीरीं रघुनंदन ॥ बैसला दर्भासन घालून ॥
पूजा सागरी समर्पून ॥ मित्रकुळभूषण मार्ग मागे ॥६४॥
फळ तोय वर्जून समस्त ॥ निराहार बैसला सीताकांत ॥
हिमाचळीं हिमनगजामात ॥ तप करी जयापरी ॥६५॥
तो तेथे रावणाचा हेर ॥ शार्दूळनामा होता असुर ॥
लंकापतीपुढें जाऊन सत्वर ॥ वार्ता सांगे ते काळीं ॥६६॥
म्हणे कमळिणीप्रियभूषण ॥ अगाध वानरसमुदाय घेऊन ॥
प्रतापसिंधु रघुनंदन ॥ जळसिंधुतीरीं राहिला ॥६७॥
ऐसा समाचार ऐकतां साचार ॥ चिंतेनें व्यापिला दशकंधर ॥
मग शुकनामें असुर ॥ दशकंधर त्यासी सांगे ॥६८॥
तूं आमचा बंधु होसी ॥ जाऊन सांग सुग्रीवासी ॥
तुज काय कारण सीतेसी ॥ परतोन जाईं माघारा ॥६९॥
मग तो शुक रूप जाहला ॥ क्षणें सिंधू उल्लंघूनि आला ॥
अंतरिक्षीं उभा राहिला ॥ बोलों लागला धीटपणें ॥७०॥
म्हणे मज पाठविलें रावणें ॥ वानरेश्वरा तूं एक वचनें ॥
तुवां शीघ्र परतोनी जाणें ॥ मर्कटसेना घेऊनियां ॥७१॥
आम्ही जानकी आणिली हिरून ॥ तरी तुम्हांसी यावया काय कारण ॥
व्यर्थ वेंचू नका प्राण ॥ जावें परतोन किष्किंधे ॥७२॥
जरी तुम्ही न जाल परतोन ॥ तरी मी शुक स्वकरेंकरून ॥
तुमची शिरकमळें छेदून ॥ नेईन आतां लंकेसी ॥७३॥
ऐसें बोलतां शुक निशाचर ॥ परम क्रोधावले वानर ॥
बहुत धांविन्नले वीर ॥ आसडून खालीं पाडिला ॥७४॥
बहुत मिळोनी कुंजर ॥ ताडिती जैसें एक मार्जार ॥
पाणिप्रहारें तैसा असुर ॥ वानरवीरीं ताडिला ॥७५॥
परम कासावीस होऊन म्हणे मज राघवा सोडवीं येथून ॥
कृपासागर रघुनंदन ॥ पाहे विलोकून त्याकडे ॥७६॥
सुमित्रासुत म्हणे सोडा सत्वर ॥ तात्काळ मुक्त करिती वानर ॥
सवेंचि गगनीं उडोनि असुर ॥ मागुतीं बोले निंद्योत्तरें ॥७७॥
म्हणे एथून जाय तूं किष्किंधापति ॥ न धीर रामाची संगती ॥
जैसें देवांचे बुद्धी छळितां उमापती ॥ पुष्पचाप भस्म झाला ॥७८॥
तुम्हांसी मारावया देख ॥ घेऊन आला रघुनायक ॥
तुम्ही वानर शतमूर्ख ॥ नेणा हित आपुलें ॥७९॥
ऋषभ म्हणे रे शुका ॥ दुर्बुद्धि मलिना मशका ॥
जाऊनि सांगे दशमुखा जनकात्मजा सोडी वेगीं ॥८०॥
तूं आमुचा शत्रु साचार ॥ तुज वधावया आला रघुवीर ॥
तुझीं दाही शिरें छेदून सत्वर ॥ बळी देईल दशदिशां ॥८१॥
शुक म्हणे सीता गोरटी ॥ पुन्हां न पडे तुमचे दृष्टीं ॥
मर्कटहो व्यर्थ कष्टी ॥ कासया होतां उगेची ॥८२॥
ऐसें ऐकतां वाळिनंदन ॥ म्हणे धरा धरा मागुतेन ॥
तो तात्काळ वानरीं आसुडोन ॥ केले ताडण ते वेळां ॥८३॥
मग करचरण बांधोन ॥ शुक ठेविला रक्षून ॥
असो इकडे रघुनंदन ॥ समुद्रासी मार्ग मागे ॥८४॥
तीन दिवसपर्यंत ॥ गुणसमुद्र रघुनाथ ॥
समुद्राची वाट पहात ॥ परी तो उन्मत्त सर्वदा ॥८५॥
परम क्षोभला रघुनाथ ॥ म्हणे हा समय नोळखे यथार्थ ॥
यास मी मान दिधला बहुत ॥ सागरनिर्मित म्हणोनिया ॥८६॥
लवणजळविषेंकरून ॥ सर्प हा पसरला लंबायमान ॥
आतां यावरी बाण सुपर्ण ॥ सोडितां भक्षील क्षणार्धे ॥८७॥
माझा बाण वडवानळ ॥ क्षणें शोषील समुद्रजळ ॥
जैसें ज्ञान प्रवेशतां सकळ ॥ अज्ञान जाय निरसोनी ॥८८॥
की माझा बाण कलशोद्‌भव ॥ क्षणें शोषील जळार्णव ॥
सूर्य उगवतां तम सर्व ॥ जाय जैसें निरसोनी ॥८९॥
मागुती क्षण एक वाट पाहून ॥ उभा ठाकला रघुनंदन ॥
धनुष्यावरी योजिला बाण ॥ अर्ध क्षण न लागतां ॥९०॥
बाणाचे मुखी ब्रह्मास्त्र ॥ स्थापिता जाहला राजीवनेत्र ॥
की क्षोभला प्रळयरुद्र ॥ अक्षय सागर देखतां ॥९१॥
आकर्ण चाप ओढितां प्रचंड ॥ भयें तडाडी विरिंचिअंड ॥
जळचर खेचरें उदंड ॥ मूर्च्छना येऊन पडियेलीं ॥९२॥
निशा संपतां समग्र ॥ उदयाद्रीवरी ये मित्रचक्र ॥
तैसा दिव्यरूप समुद्र ॥ सरितांसहित प्रगटला ॥९३॥
यागीं होतां पूर्णाहुती ॥ तात्काळ प्रगटे आराध्यमूर्ति ॥
तैसा प्रगटला सरितापति ॥ परिवारेंसी तेधवां ॥९४॥
वंदूनियां रघुवीरचरणां ॥ म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥
स्मरारिमित्रा आनंदसदना ॥ जानकीजीवना रघुपति ॥९५॥
तूं कृपासमुद्र रघुवीर ॥ कां हे लहरी आली क्रूर ॥
माझा अन्याय नसतां शर ॥ धनुष्यावरी घातला ॥९६॥
माझा स्वभाव रघुनंदना ॥ सर्वदाही करावी गर्जना ॥
तुजसीं गर्व गर्वहरणा ॥ सर्वथाही केला नाही ॥९७॥
मग म्हणे रघुनंदन ॥ म्यां शरासनी योजिला बाण ॥
पुन्हा काढितां नये पूर्ण ॥ यासी कारण सांग कांहीं ॥९८॥
यावरी बोले सरितानाथ ॥ पश्चिमेस असे मरु दैत्य ॥
तो माझी जळचरें भक्षित ॥ सदा पीडितो गोब्राह्मणां ॥९९॥
त्यावरी टाकूनियां बाण ॥ मरूचा तात्काळ घ्यावा जी प्राण ॥
तों शर गेला न लागतां क्षण ॥ कल्पांतचरपळेसारिखा ॥१००॥
जळीं जीव वधितां मरु दैत्य ॥ शिर छेदिलें अकस्मात ॥
जीवन शोषिलें तेथ बहुत ॥ मारवाडदेश वसिन्नला ॥१॥
अद्यापि तिकडे अल्प जळ ॥ परी वृक्षवल्ली सदा सुफळ ॥
असो सागरें तमालनीळ ॥ जामात म्हणोनि पूजिला ॥२॥
मग सर्व पूजा आणून ॥ घनश्यामगात्र रघुनंदन ॥
अपर्णावराचें मनरंजन ॥ हर्षे पूजी श्रीरामचंद्रा ॥३॥
दिव्यालंकार दिव्य वस्त्रें ॥ अमोलिक रत्‍नें प्रभाकरें ॥
राघवापुढें नदीश्वरें ॥ समर्पिलीं ते काळीं ॥४॥
सागर म्हणे अयोध्यानाथा ॥ वस्त्रे भूषणें लेईं समर्था ॥
नृपास वल्कलें तत्त्वतां ॥ रिपुसन्मुख योग्य नव्हे ॥५॥
अयोध्यानाथा नृपवरा ॥ करूनि यांच्या अंगीकारा ॥
मग समरंगणीं दशकंधरा ॥ खंड विखंड करावें ॥६॥
बैसावया दिव्य रथ ॥ समरीं पाठवील शचीनाथ ॥
वानर सुग्रीवादि समस्त ॥ विनविती तेव्हां रघूत्तमा ॥७॥
स्वामी आम्हां समस्तांचे मनीं ॥ वस्त्रे भूषणें घ्यावीं ये क्षणीं ॥
भक्तवचनें चापपाणी ॥ मानिता झाला ते वेळे ॥८॥
कल्पांतचपळेसमान ॥ राघव नसेला पीतवसन ॥
उत्तरीय प्रावरण दैदीप्यमान ॥ कीं चंडकिरण प्रकाशला ॥९॥
सांवरूनि जटाभार ॥ वरी मुकुट घातला सुंदर ॥
तेज तळपतसे अपार ॥ दिकृचक्रांमाजी न समाये ॥११०॥
प्रळयचपळेचे उमाळे उठती ॥ तेवी दिव्य कुंडलें तळपती ॥
कीं कवि आणि अंगिरापती ॥ कर्णीं शोभती साचार ॥११॥
मुक्ताफळमाळा बहुत ॥ रघुपतीच्या गळां डोलत ॥
कीं मुक्तरूपें समस्त ॥ अनंत ब्रह्मांडें गुंफिलीं ॥१२॥
मुक्ताफळांचे तेज गहन ॥ परी त्यांचा पालटला वर्ण ॥
दिसती इंद्रनीळसमान ॥ श्यामलांगीं रघुपतीच्या ॥१३॥
जेंवि निष्कलंक मृगांक ॥ तेंवि हृदयी झळके पदक ॥
कटीं मेखळेचें तेज अधिक ॥ देखतां अर्क भुले पैं ॥१४॥
वेदांतीच्या श्रुति गहन ॥ अर्थ बोलती जेंवि शोधून ॥
तैशा क्षुद्रघंटा रुणझुण ॥ शब्द करिती रसाळ ॥१५॥
तीक्ष्ण प्रभेची चके्रं तळपती ॥ तैशा मुद्रिका करी झळकती ॥
पदी नेपुरें गर्जती ॥ असुरांवरी प्रतापें ॥१६॥
नीळ गगनावरी सुंदर ॥ मंदाकिनीओघ दिसे शुभ्र ॥
तैसा अम्लान सुमनहार ॥ श्यामलांगीं शोभतसे ॥१७॥
असो दिव्यगंधीं दिव्यसुमनीं ॥ सागरें पूजिला चापपाणी ॥
तैसाचि लक्ष्मण तये क्षणी ॥ वस्त्रालंकार गौरिविला ॥१८॥
देव करिती जयजयकार ॥ वर्षती दिव्यपुष्पसंभार ॥
भुभुःकारें गर्जती वानर ॥ तेणें अंबर कोंदलें ॥१९॥
असो जगदात्मा रघुवीर ॥ जो कां सर्वांनंदमंदिर ॥
सागराप्रति राजीवनेत्र ॥ काय बोलता जाहला ॥१२०॥
म्हणे सुवेळेसी जावया दळभार ॥ उपाय सांगे कांहीं सत्वर ॥
सागर म्हणे नळ वानर ॥ ऋषीचा वर त्यास असे ॥२१॥
नळ कपि बाळपणीं ॥ शाळिग्राम टाकी जळीं नेउनी ॥
मग ऋषि म्हणती जीवनीं ॥ पाषाण तरोत तव हस्तें ॥२२॥
यालागी सुवेळेपर्यंत ॥ नळाचे हस्तें बांधी सेतु ॥
असो आज्ञा मागोनि सरितानाथु ॥ जाहला गुप्त स्वस्थानीं ॥२३॥
याउपरी कौसल्यानंदन ॥ नळ कपि जवळी बोलावून ॥
म्हणे धन्य धन्य वरदान ॥ जळीं पाषाण तारीं आतां ॥२४॥
धन्य धन्य तुझी माउली ॥ तुज ऐसें रत्‍न प्रसवली ॥
तरी सखया आतां ये काळीं ॥ प्रगट करी सामर्थ्य तुझें ॥२५॥
ऐसें बोलतां रघुवीर ॥ भुभुःकारें गर्जती वानर ॥
पाषाण पर्वत अपार ॥ समुद्रजळी टाकिती ॥२६॥
लागतां नळाचा वरदहस्त ॥ समुद्रीं तरती काष्ठवत ॥
कीं तुंबिनीफळें तरत ॥ पाषाण पोहती त्यापरी ॥२७॥
कीं सद्‌गुरूचे कृपेंकरूनी ॥ भवजळीं तरती बहुत प्राणी ॥
तैसीच नळाची करणी ॥ पाषाण जळीं तरले हो ॥२८॥
इकडे अठरा पद्में वानर ॥ बहात्तर कोटी रीस वीर ॥
पर्वत तरुवर ॥ संख्यारहित आणिती ॥२९॥
असंभाव्य उचलिती पर्वत ॥ वरी ग्रामतटाकांसहित ॥
ऐशा नगांच्या उतरंडी बहुत ॥ धांवताती घेऊनि ॥१३०॥
भार वानरांचे धांवती ॥ चालतां न दिसे खाली क्षिती ॥
लक्षांचे लक्ष पर्वत टाकिती ॥ नव्हे गणती शेषातें ॥३१॥
त्याहीमाजी हनुमंत ॥ विशाळरूप धरी अद्‌भुत ॥
कीं मंदराचळचि धांवत ॥ रामकार्याकारणें ॥३२॥
तरी तो महाराज हनुमंत ॥ तेणें किती वाहिले पर्वत ॥
मूळकाव्यामाजी गणित ॥ केले असे ऐका तें ॥३३॥
वेदसंख्यालक्ष पर्वत ॥ पुच्छें वेष्टित आधीं हनुमंत ॥
शास्त्रसंख्यालक्ष शिरीं ठेवित ॥ हातीं घेत लक्षद्वय ॥३४॥
बहुत नगांच्रूा पंक्ति ॥ स्कंधीं बैसवी हो मारुति ॥
मागें सांडोनि समीरगती ॥ आकाशपंथें धांवतसे ॥३५॥
वानर श्रमले असंख्यात ॥ ठायी ठायी पडती निद्रिस्त ॥
परी श्रमरहित हनुमंत ॥ असंख्यात खेपा करी ॥३६॥
आश्चर्य करी अयोध्यापाळ ॥ म्हणे धन्य मारुतीचें बळ ॥
संख्यारहित अचळ ॥ रिचवी नेऊन सागरीं ॥३७॥
प्रथमदिवशीं नळें अद्‌भुत ॥ चौदा गांवें बांधिला सेत ॥
परी अभिमान धरिला बहुत ॥ माझेनि तरती पाषाण हे ॥३८॥
तंव निमेषामाजी एक मीन आला ॥ तेणें सर्व सेतु गिळिला ॥
सवेंच दिनमणि उगवला ॥ तों सेतु नाही त्या स्थळीं ॥३९॥
सुग्रीवादि वानर तर्क करिती ॥ रावणें नेला सेतू म्हणती ॥
मग रघुपतीस जाणविती ॥ सेतू नाही म्हणूनियां ॥१४०॥
मग श्रीरामें शरभासीं सांगूनी ॥ तिमिंगिल मत्स्य आणविला ते क्षणीं ॥
शरभ म्हणे सेतू शोधूनि ॥ वेगें आणूनि देइंजे ॥४१॥
नाहीं तरी अयोध्यानाथ ॥ तुम्हांस शिक्षा करील बहुत ॥
यावरी तिमिंगिल बोलत ॥ राघवापुढें ते वेळां ॥४२॥
मी दर्शनास येतेवेळे ॥ मागें येत होतीं लघु बाळें ॥
त्यांही गिळिला शीघ्रकाळें ॥ बाळभावेंकरूनियां ॥४३॥
तयां हातें बांधवीन क्षणांत ॥ अथवा स्वपृष्ठीचा करीन सेत ॥
हास्यवदन करी रघुनाथ ॥ म्हणे करणी अद्‌भुत बाळांची ॥४४॥
गर्वहत नळ होऊन ॥ खालीं पाहे अधोवदन ॥
असो मत्स्यशिशूनें सेतू उगळून ॥ आणून ठेविला पूर्वस्थळीं ॥४५॥
मग त्यापुढें कपी नळ ॥ सेतू बांधिता जाहला विशाळ ॥
परी जळी पडतां ते अचळ ॥ मत्स्य गिळिती सेवेगें ॥४६॥
मत्स्य गिळिती अचळ ॥ उगाचि तटस्थ पाहे नळ ॥
तो मत्स्यरूपी केशव विशाळ ॥ जळचरांप्रति सांगतसे ॥४७॥
म्हणे मी आणि रघुवीर ॥ दोघे एकरूप साचार ॥
सेतुबंधनासी निर्धार ॥ विघ्न कांही न करावें ॥४८॥
नळासी साह्य होऊन ॥ तळीं पृष्ठी द्या अवधे जण ॥
असो पर्वत गिळितां राहिले मीन ॥ नवल जाहलें ते वेळीं ॥४९॥
परी पर्वत शिळा उसळोन ॥ दूर जाती वाहून ॥
नळाची विकळ मति होऊन ॥ तटस्थरूप जाहला ॥१५०॥
मग नळासी म्हणे हनुमंत ॥ सखया गर्व न धरी किंचित ॥
अवघाकर्ता रघुनाथ ॥ अभिमान तेथें कासया ॥५१॥
स्तंभावीण आकाश धरी ॥ उदकावरी तारी धरित्री ॥
मित्र शशी उडुगणें निर्धारीं ॥ वायुचक्री चालवी जो ॥५२॥
अनंत ब्रह्मांड मोडून ॥ सवेंचि निर्मी न लागतां क्षण ॥
त्या रामापुढें अभिमान ॥ कोठें चालेल जीवांचा ॥५३॥
जैसा उगवतां वासरमणी ॥ मृगांकतेज लोपे ते क्षणीं ॥
तेथें खद्योत स्वेतेजेंकरूनी ॥ उजळील काय नभातें ॥५४॥
यालागीं गर्व सांडोनी ॥ सांगतों ते वर्म धरी मनीं ॥
रकारें एक शिला रेखुनी ॥ काना देऊनि करी गुरु ॥५५॥
दुजे शिळेवरी रेखीं मकार ॥ दोहींस करी एकंकार ॥
तूं म्हणसी रामनाम पवित्र ॥ सेतूवरी केवीं लिहूं ॥५६॥
कपी देतील वर चरण ॥ हा संशय धरी तुझंं मन ॥
बरे मुख्य भेदासी कारण ॥ तो अभिमान सोडी कां ॥५७॥
मुख्य रामनाम पाहीं ॥ हृदयीं अभेद रुळे सदाही ॥
मग ते पाषाण सहसाही ॥ भेदभाव न धरिती ॥५८॥
हनुमंतवचन तीक्ष्ण कुठार ॥ समूळ छेदिला अभिमानतरुवर ॥
मग निरभिमानें नळवीर ॥ तैसेंचि करिता जाहला ॥५९॥
करितांच श्रीरामस्मरण ॥ नळ कपी जोडी पाषाण ॥
तो तेथें सम विषम थोर लहान ॥ भेदाभेद न दिसेचि ॥१६०॥
हनुमंत काव्यांतील हृद्‌गत ॥ चतुरीं जाणिजे हा भावार्थ ॥
सेतुपंथें नाम यथार्थ ॥ नळें नाही रेखिलें तें ॥६१॥
दुजयासी पाषाण जे बुडवित ॥ ते सागरीं तरती तारुवेत ॥
हा नळाचा गुण नव्हे निश्चित ॥ अदभुत महिमा रामाचा ॥६२॥
सेतू बांधावया कारण ॥ नळ रामेंचि केला निर्माण ॥
भक्तवत्सल रघुनंदन ॥ महिमा वाढवी दासांचा ॥६३॥
असो बाणसंख्यादिवसांत ॥ सुवेळेपर्यंत बांधिला सेत ॥
शतयोजनें लांब गणित ॥ दशयोजनें रुंद पैं ॥६४॥
गगनीं पाहती सुरवर ॥ सेतू दिसे जैसा भोगेंद्र ॥
रघुपतीतें सांगती वानर ॥ सेतू संपूर्ण केला नळ ॥६५॥
नळास बोलावून रघुनंदनें ॥ हृदयी धरिला परम प्रीतीनें ॥
म्हणे धन्य धन्य तुझें जिणें ॥ भरिलें त्रिभुवन कीर्तीनें ॥६६॥
सखया त्वां अदभुत कार्य केले ॥ अघटित तेंचि घडविलें ॥
असो रघुवीर म्हणे ते वेळे ॥ चल सुवेळे जाऊं आतां ॥६७॥
कुंचा फिरविला वीरें नळे ॥ तत्काळ उठलीं कपिदळें ॥
भुभुःकारनादें ते वेळे ॥ डळमळिला भूगोळ ॥६८॥
सुमुहूर्त वेळा पाहून ॥ उठोनि चालिले रामलक्ष्मण ॥
दशयोजनें रुंद प्रमाण ॥ सेना दाटली चालता ॥६९॥
कडेचे कोसळती वानर ॥ सवेंच उडी घेती चक्राकार ॥
वरी येऊन सत्वर ॥ सेतुपंथें चालती ॥१७०॥
रघुवीर चरणचालीं जात ॥ धांवती सुग्रीव हनुमंत ॥
म्हणती रघूत्तमा विपरीत ॥ होईल ऐसें वाटतें ॥७१॥
तुमचे पद लागतां ये वेळा ॥ उद्धरतील सेतूच्या शिळा ॥
होतील अहल्येऐशा अबळा ॥ पडतील गळां कपींच्या ॥७२॥
कुटिल भाव सोडून ॥ विनोदें हांसे सूर्यनंदन ॥
मग हनुमंतस्कंधी रघुनंदन ॥ आरूढला ते वेळां ॥७३॥
अंगदाच्या स्कंधावरी ॥ सौमित्र बसे ते अवसरीं ॥
बाळसूर्य उदयाद्रीवरी ॥ त्याचपरी शोभतसे ॥७४॥
न भरतां अर्धप्रहर ॥ सूवेळेसी आला रघुवीर ॥
सेना उतरली अपार ॥ लंकानगर गजबजिलें ॥७५॥
शुकास केले होते बंधन ॥ तो राघवें दिधला सोडून ॥
तेणें रघुपतीचे वंदोनि चरण ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥७६॥
मग रावणापुढें अदभुत ॥ राघवप्रताप शुक सांगत ॥
म्हणे जयासी समुद्र सरितांसहित ॥ मूर्तिमंत भेटला ॥७७॥
धन्य प्रतापी रघुनंदन ॥ जळी तारिलें पाषाण ॥
परमशक्तिवानरगण ॥ कळिकाळासी न गणिती ॥७८॥
तुम्ही निरोप जे सांगितले ॥ तितुके मित्रपुत्रासी कथिले ॥
तंव तिही धांवोनि मजला धरिलें ॥ बांधोनि पाडिलें आजिवरी ॥७९॥
करुणासागर रघुनंदन ॥ तेणें आज दिधलें सोडून ॥
आतां राजा जानकी नेऊन ॥ सत्वर रामासी समर्पावी ॥१८०॥
सखा करितां रघुनंदन ॥ तेणें चंद्रार्कवरी कल्याण ॥
ऐकतां क्षोभला रावण ॥ म्हणे केले ताडण तिहीं तुज ॥८१॥
भय घेतलें मानसीं ॥ म्हणोनि भलते वाचाळसी ॥
शत्रुप्रताप मजपुढें वानिसी ॥ तरी मृत्यु पावसी निर्धारें ॥८२॥
मग शुक आणि सारण ॥ दोघां सांगे दशवदन ॥
म्हणे सुवेळेसी जाऊन ॥ सैन्य गणोनि या वेगीं ॥८३॥
मुख्य मुख्य कोण वानर ॥ कोणासवें किती भार ॥
ऐसें पाहूनि सत्वर ॥ परता रक्षूनि आपणां ॥८४॥
आज्ञा वंदूनि दोघांजणीं ॥ कपिसेनेंत आले ते क्षणी ॥
वानरवेष धरूनि ॥ सैरावैरा हिंडती ॥८५॥
सेना धुंडोनि सकळ ॥ मग जेथें असे अयोध्यापाळ ॥
लक्षीत ते सभामंडळ ॥ उभे दूर राहूनियां ॥८६॥
तो बिभीषणाची दृष्टि ते काळी ॥ अकस्मात दोघांवरी पडली ॥
धांवोनि धरिले ते वेळीं ॥ राघवाजवळी आणिले ॥८७॥
म्हणे हे रावणाचे हेर ॥ इही सेना गणिली समग्र ॥
वेष पालटोनी वानर ॥ होऊन हिंडती स्वईच्छा ॥८८॥
चुना मोखानि वायस ॥ जाहले जैसे राजहंस ॥
कीं धरूनि ब्राह्मणांचा वेष ॥ मैंद जैसे हिंडती ॥८९॥
कीं खोटेंनाटे करून ॥ खर्‍यांत मेळविती कुजन ॥
मग परीक्षककाढिती निवडोन ॥ दोघेजण तैसे धरिले ॥१९०॥
मग राजाधिराज रघुनंदन ॥ सुहास्यवदन बोले वचन ॥
म्हणे या दोघांस करी धरून ॥ दाखवा सैन्य समस्तही ॥९१॥
सकळ वृत्तांत आणूनि मना ॥ जाऊनि श्रुत करा दशवदना ॥
तंव ते म्हणती रघुनंदना ॥ मखपाळका विश्वेशा ॥९२॥
आम्हीं महिमा एकिली कर्णीं ॥ तो राम आजि देखिला नयनीं ॥
असो श्रीरामाची आज्ञा घेउनी ॥ दोघे परतले लंकेसी ॥९३॥
आले देखोन दोघे हेर ॥ षोडश खणांचे गोपुर ॥
त्यावरी चढला दशकंधर ॥ सेवक अपार भोंवते ॥९४॥
हेरांप्रति पुसे रावण ॥ सांगा येथून कोणाचे कोण ॥
मग ते दाविती दोघेजण ॥ संकेतवर्ण लक्षूनियां ॥९५॥
वानरसेना दशयोजन ॥ सभोंवती उतरली वीस्तीर्ण ॥
एकएक वीर दैदीप्यमान ॥ बळवंत आणि प्रतापी ॥९६॥
वानरसिंधूचें मव्यमंडळ ॥ जुत्पत्ति उभे भोंवते सकळ ॥
त्या मध्यभागीं तमालनीळ ॥ वस्त्राभरणीं मंडित दिसे ॥९७॥
कनकहरिणचर्मी पूर्ण ॥ पहुडलासे रघुनंदन ॥
सुग्रीवाचे मांडीवरी शिर ठेवून ॥ गोष्टी सांगे कौतुकें ॥९८॥
जाळूनि गेला लंकानगर ॥ सवेंच घेऊन आला रघुवीर ॥
तो हनुमंत वायुकुमर ॥ चरण चुरी रामाचे ॥९९॥
तुमचा बंधु बिभीषण ॥ रघुनाथनिकट बैसोन ॥
जे जे झाले वर्तमान ॥ गोष्टी सांगे रामकर्णीं ॥२००॥
दैदीप्यमान दिनकर ॥ तैसा रामाचे पाठीसी सौमित्र ॥
पैल अंगद महावीर ॥ क्रोधे पाहे आम्हांकडे ॥१॥
पैल सुषेण वैद्य महावीर ॥ हा सूर्यसुतासी होय श्वगुर ॥
वीसकोटी वानरभार ॥ त्यासांगातें पुरुषार्थी ॥२॥
पैल जांबुवंत ऋक्षवीर ॥ तयाचा बहात्तरकोटी दळभार ॥
पैल सेनाधिपती नीळ वीर सामर्थ्य अपार पैं त्याचें ॥३॥
जेणें शिळीं बांधिला सागर ॥ नळ नाम बळसमुद्र ॥
शरभ ऋषभ पर्वताकार ॥ युद्धसमय वांछिती ॥४॥
असो आतां वानरगण ॥ त्यांचीं नामें सांगतां पूर्ण ॥
उर्वी न पुरे करितां लेखन ॥ बळार्णव सर्वही ॥५॥
यालागीं दशकंधरा अवधारीं ॥ त्यांसी युद्ध करितां समरीं ॥
काळाचीही न उरे उरी ॥ मग इतर तेथें कायसे ॥६॥
ऐसें बोलतां शुक सारण ॥अत्यंत क्रोधावला रावण ॥
म्हणे तुमचा शिरच्छेद करून ॥ टाकावा ऐसें वाटतसे ॥७॥
येरू म्हणती आम्ही तुमचे हेर ॥ सत्य सांगावा समाचार ॥
असत्य बोलूं तरी साचार ॥ दंड करावा आम्हांतें ॥८॥
असो इकडे बिभीषण ॥ समस्तांसी दावी तर्जनी उचलून ॥
म्हणे पैल पहा रावण ॥ गोपुरावरी चढलासे ॥९॥
दहा शिरांवरी दाहा छत्रें ॥ दाहा विलसती मित्रपत्रें ॥
सेवक करी ढाळिती चामरें ॥ एकीं पिकमात्रें धरियेली ॥२१०॥
जैसा मघे उतरे पर्वतशिखरीं ॥ तैसा रावण भासे गोपुरीं ॥
अलंकारदीप्ति महीवरी ॥ विद्युत्प्राय झळकतसे ॥११॥
ऐसी आपुली संपदा पूर्ण ॥ शत्रूलागीं दाखवी रावण ॥
छत्रछायेखालीं रामसैन्य ॥ झांकून गेले ते समयीं ॥१२॥
जैसें उठतां मेघडंबर ॥ खालीं आच्छादे जग समग्र ॥
सेनेसहित रामचंद्र ॥ छत्रछायेतळीं तैसा ॥१३॥
ऐसा देखानि लंकापती ॥ कपिवीर क्षोभले चित्तीं ॥
सौमित्रें चाप घेतलें हातीं ॥ निमिषार्ध न लागतां ॥१४॥
लाविला अर्धचंद्रबाण ॥ ओढी ओढिली आकर्ण ॥
कल्पांतचपळेसमान ॥ चापापासूनि सूटला ॥१५॥
मुकुट छत्रे ते अवसरीं ॥ तोडून पाडिली धरणीवरी ॥
रावण घाबरला अंतरीं ॥ खालीं झडकरी उतरला ॥१६॥
म्हणे कोण्या वीरांचे संधान ॥ पाडिली दहाही छत्रें खंडून ॥
अन्न पान शयन ॥ गोड न लागे रावणातें ॥१७॥
कपाळशूळें आरंबळे व्याघ्र ॥ कीं वणव्यांत आहाळे अजगर ॥
तैसा दुःखें दशकंधर ॥ चिंताक्रांत सर्वदा ॥१८॥
रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हाचि केवळ क्षीरसागर ॥
साहित्य शेषशयन अरुवार ॥ वरी सर्वेश्वर पहुडला ॥१९॥
तेथें सप्रेम कळा लक्ष्मी ॥ सदा विलसे पादपद्मीं ॥
तरी सद्‌भाविक श्रोते तुम्ही ॥ पार्षदगण हरीचे ॥२२०॥
सुंदरकांड संपले येथोन ॥ पुढे युद्धकांड सुरस पूर्ण ॥
तें रसभरित भक्तजन ॥ करोत श्रवण सर्वदा ॥२१॥
जो अयोध्यापति रघुनंदन ॥ तेणेंच धनुष्यबाण ॥
दोनी कर जधनीं ठेवून ॥ भीमातटीं उभा असे ॥२२॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पांडुरंगा पुंडलीकवरदा ॥
भक्तहृदयारविंदमिलिंदा ॥ अभंग अभेदा जगद्‌गुरु ॥२३॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ त्रयोविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२२४॥
सुंदरकाण्ड समाप्त ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय चोविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कळेल समुद्राचा अंत ॥ सांपडेल अंबराचें गणित ॥
त्याहून रामकथा अद्‌भुत ॥ नलगे अंत कवणातें ॥१॥
अद्‌भुत धांवे प्रभंजन ॥ त्याची मोट बांधवेल आकर्षून ॥
परी या रघुपतीचे चरण ॥ वर्णितां अंत न कळेची ॥२॥
सहस्रवदनेंकरून ॥ वर्णी काद्रवेयकुळभूषण ॥
नेति नेति म्हणोन ॥ वेदही तेथे तटस्थ ॥३॥
रघुवीरगुणांची सरोवरपाळ ॥ तेथें व्यास वाल्मीक हे मराळ ॥
ज्यांच्या मतीमाजी सकळ ॥ ब्रह्मांड हे ठेंगणें ॥४॥
तिहीं गुण वर्णितां अपार ॥ अंत न कळेचि साचार ॥
तेथें मानवशलभ पामर ॥ गुणांवर केविं क्रमी ॥५॥
तरी सांडोनि अभिमान ॥ वर्णावे रघुपतीचे गुण ॥
गंगाप्रदेश म्हणोन ॥ तृषाक्रांता केवि सोसवे ॥६॥
तैसे सीतावल्लभाचे गुण ॥ वर्णावे यथामतिकरोन ॥
असो पूर्वाध्यायीं अनुसंधान ॥ आला रघुवीर सुवेळे ॥७॥
आतां वाग्देवी परम डोळस ॥ उघडी युद्धकांडमांदुस ॥
त्यांतील साहित्यरत्‍नें विशेष ॥ ग्राहक पंडित तयांचे ॥८॥
रावणाचीं दाही छत्रें ॥ छेदोनि पाडिलीं सौमित्रें ॥
परम म्लान दाही वक्रें ॥ मयजापतीची जाहली ॥९॥
सकळ प्रधानांसहित ॥ विचारा बैसला लंकानाथ ॥
माझे तरी दोन हेत ॥ कैसे पुरती नेणें मी ॥१०॥
रामलक्ष्मणां संहारूनी ॥ वश्य व्हावी जनकनंदिनी ॥
यावेगळी माझे मनीं ॥ चिंता दुसरी नसेचि ॥११॥
तंव वज्रदंष्ट्र म्हणे लंकानाथा ॥ सीतेची भीड कासया धरितां ॥
बळेंचि आणोनि तत्वतां ॥ कामना आपुली पुरविजे ॥१२॥
मग बोले दशकंधर ॥ मज विरिंचीचा शाप थोर ॥
परस्त्रीवरी करितां बलात्कार ॥ शतचूर्ण तरु होय पैं ॥१३॥
मृगपतीचे फुटले नयन ॥ कीं व्याघ्राचे हस्त टाकिले तोडोन ॥
कीं भुजंगाचे दांत पाडून ॥ केली दीन गारोडिये ॥१४॥
वनी सर्वांत श्रेष्ठ वारण ॥ परी सिंह देखतां तात्काळ मरण ॥
तैसा मी शापबंधनें पूर्ण ॥ बळक्षीण जाहलों ॥१५॥
तरी ते जनकजा मनींहूनी ॥ आपणचि वश्य होईल शयनीं ॥
ऐसी करणी करा कोणी ॥ राघवीं मन विटे तिचें ॥१६॥
मग विद्युज्जिह्व प्रधान ॥ जो कापट्यविद्येमाजी प्रवीण ॥
तो म्हणे मी निर्मीन ॥ रघुत्तमाचें शिरकमळ ॥१७॥
आणि राघवहस्तींचे कोदंड ॥ मायामय निर्मीन प्रचंड ॥
तेणें सीतेचें हृदयखंड ॥ असत्य न वाटे सहसाही ॥१८॥
ऐसें ऐकतांचि लंकापति ॥ परम संतोषला पावला चित्तीं ॥
जैसा मद्यपी पाहतां पंथीं ॥ तंव शिंदीवन देखिलें ॥१९॥
आधीच जारकर्मीं रत ॥ त्यांत स्त्रीराज्य जाहलें प्राप्त ॥
कीं श्वानें वमन अकस्मात ॥ दृष्टीं देखिलें तेधवां ॥२०॥
कीं निंबोळ्या देखतां बहुवस ॥ परम संतोषे वायस ॥
तैसा हर्षला लंकेश ॥ वचन ऐकतां तयाचें ॥२१॥
विद्युज्जिव्हासी म्हणे लंकापति ॥ आम्हांमध्ये तूं केवळ बृहस्पती ॥
तरी शीघ्र शिरधनुष्यांप्रति ॥ घेवोनि येईं अशोकवना ॥२२॥
कापट्यवेषी विद्युज्जिव्हा ॥ वस्त्राभरणी गौरविलें तेव्हां ॥
कृत्रिम निर्मिले तेधवां ॥ तर्क करितां नेणवेची ॥२३॥
इकडे आधी लंकानाथ ॥ प्रवेशला अशोकवनांत ॥
तों अधोवदनें तटस्थ ॥ जगन्माता बैसली ॥२४॥
सीतेजवळी उभा रावण ॥ जैसा कमळिणीसमीप वारण ॥
कीं हरिणीजवळी येऊन ॥ व्याघ्र उभा ठाकला ॥२५॥
याउपरी राक्षसपाळ ॥ सीतेजवळी बोले अमंगळ ॥
म्हणे तुवां धैर्य धरिलेंसे सबळ ॥ परी ते निष्फळ जाहलें ॥२६॥
मजलागीं तूं आतां वरीं ॥ तुझें सेवेसी मंदोदरी ॥
तुझे आज्ञेत लंकानगरी ॥ वर्तवीन जानकीये ॥२७॥
तुझीया पतीस जाहले मरण ॥ आधी ते ऐके वर्तमान ॥
सागरीं सेतू बांधोन ॥ सुवेळेसी सर्व आले ॥२८॥
तंव आमचा प्रधान प्रहस्त ॥ निमेषामाजी गेला सेनासमवेत ॥
राम सौमित्र होते निद्रिस्थ ॥ तंव घाला तिहीं घातला ॥२९॥
तुझीया पतीचे शिरकमळ ॥ प्रहस्तें छेदिलें तात्काळ ॥
सांवळे कबंध विशाळ ॥ सुवेळेसी पडियेलें ॥३०॥
वधावा जो लक्ष्मण ॥ तंव तो अयोध्येसी गेला पळून ॥
आमचा बंधु बिभीषण ॥ तोही तेथेंचि पडियेला ॥३१॥
सुग्रीव आणि अंगद ॥ त्यांचाही केला शिरच्छेद ॥
जांबुवंत आणि मैंद ॥ यांचे जानुचरण खंडिले ॥३२॥
नळ नीळ अंजनीसुत ॥ निजले ठायीं केले चूर्णवत ॥
वरकड मर्कटें सैन्य बहुत ॥ राक्षसी सर्व गिळियेलीं ॥३३॥
सेतू पाडिला समग्र ॥ मग कोठें पळतील वानर ॥
शोणिताचे वाहती पूर ॥ जाती भेटों सागरातें ॥३४॥
हें जरी तूं असत्य मानिसी ॥ तरी आतांचि येईल प्रत्ययासी ॥
विद्युज्जिव्ह वेगेंसी ॥ शिर घेवोनि पातला ॥३५॥
तेणें धनुष्य आणि शिर ते वेळे ॥ रामवल्लभेपुढें आणोनि ठेविलें ॥
मुख राजस सांवळे ॥ शोणितें माखलें ते काळी ॥३६॥
किरीटकुंडलें मंडित वदन ॥ सरळ नासिक झळकती दशन ॥
कपाळी केशर आकर्ण नयन ॥ आरक्त रेखांकित जें ॥३७॥
ऐसे देखतां जनकनंदिनी ॥ मूर्च्छना येऊनि पडे धरणी ॥
की अग्नीत पडली कमळिणी ॥ जाय करपोनी जयापरी ॥३८॥
तंव ते दशकंठरिपूची प्रिया ॥ उठे मूर्च्छना सांवरूनियां ॥
हृदयी शिरकमळ धरोनियां ॥ शोक करी अद्‌भुत ॥३९॥
अहो ते त्रिभुवनपतीची राणी ॥ शोकार्णवीं बुडाली ते क्षणी ॥
तो शोक सांगता उलथे धरणी ॥ कवीची वाणी कुंठित ॥४०॥
म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ स्मरारिमित्रा जगन्मोहना ॥
अनंतगुणसंपन्ना ॥ काय ऐसें हे केले ॥४१॥
चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ रघुवीरा श्रमलेति वनांत ॥
कोमळ चरणी बहुत ॥ कंटक हरळ रूतले ॥४२॥
मजकारणें श्रमलां काननी ॥ अहा सीता म्हणवोनी ॥
तृण पाषाण हृदय धरोनी ॥ उद्धरिले की रघुपती ॥४३॥
मजकारणें वाळी मारिला ॥ सूर्यसुत मित्र केला ॥
हनुमंत शुद्धीसी धाडिला ॥ शिळीं बांधिला सागर ॥४४॥
सुवेळे येवोनि सत्वर ॥ वैरियांशी यश दिधले अपार ॥
कां संपविला अवतार ॥ मज भवपुरीं लोटिलें ॥४५॥
रविकुलावतंस श्रावणारी ॥ त्याची स्नुषा मी जनककुमारी ॥
अयोध्याधीशा तुझी अंतुरी ॥ सोडवील आतां मज कवण ॥४६॥
मी परदेशी ये दीन ॥ रघुवीरा कोणासी जाऊं शरण ॥
सूर्यवंशी संपूर्ण ॥ डाग लागला यावरी ॥४७॥
वाल्मीकानें भविष्य केलें ॥ ते अवघें आजि बुडालें ॥
जंबुकें जाऊनि मारिलें ॥ पंचाननासी नवल हें ॥४८॥
अजाखुरींच्या जीवनी ॥ सिंह अडखळोनि पडला कैसेनी ॥
की मूषकाचिये वदनीं ॥ पंचानन सांठवे ॥४९॥
कर्पूराचे पुतळे केवळ ॥ तिहीं उभा ग्रासिला वडवानळ ॥
जगद्‌भक्षक जो जगीं काळ ॥ त्यासी भूतानें ग्रासिलें ॥५०॥
मशकाची झेंप लागतां ॥ कनकाद्रि पडला खालता ॥
श़ृगालांनी तत्वतां ॥ बांधिला कैसा ऐरावत ॥५१॥
खद्योततेजेंकरोनी ॥ कैसें ब्रह्मांड गेलें आहाळोनी ॥
पिपीलिकाउदरीं जाउनी ॥ सिंह कैसा सांठवला ॥५२॥
लागतां मक्षिकेचा पक्षवात ॥ भयभीत जाहला भोगीनाथ ॥
चित्रींच्या सर्पे अकस्मात ॥ अरुणानुज गिळियेला ॥५३॥
तैसें अघटित घडलें एथ ॥ राक्षसें जिंकिला रघुनाथ ॥
कर्माची गति गहन बहुत ॥ कैसा अनर्थ करूं आतां ॥५४॥
भूधरावतार लक्ष्मण ॥ कैसा रामासि गेला टाकोन ॥
तो अयोध्येसी जाऊन ॥ काय सांगेल भरतातें ॥५५॥
तत्काळ कौसल्या त्यजील प्राण ॥ होईल कैकयीचें समाधान ॥
लागेल सूर्यवंशासी दूषण ॥ जाहलें खंडण वंशाचें ॥५६॥
ऐसा शोक करी मंगलभगिनी ॥ मुखावरी मुख ठेउनि ॥
अश्रुधारा स्रवती ॥ नयनीं ॥ भिजे अवनी ते काळीं ॥५७॥
असो जानकी म्हणे दशमुखा ॥ हे होणार न चुके कर्मरेखा ॥
तरी मिथिलानाथ जनका ॥ समान मज अससी तूं ॥५८॥
आतां माहेर इतुकेंच करी ॥ वन्हिशेज रचोनि झडकरी ॥
या शिरासमवेत निर्धारीं ॥ अग्निमाजीं प्रवेशेन ॥५९॥
सत्व न सांडी जनकनंदिनी ॥ हें रावणासी कळले मनीं ॥
परम म्लानमुख होउनी ॥ गेला निघोनि सभेत ॥६०॥
रावण गेलिया जनकनंदिनी ॥ बुडाली शोकार्णवजीवनी ॥
तंव ते बिभीषणाची राणी ॥ सरमा आली गुप्तरूपें ॥६१॥
ते क्षणक्षणां येऊन ॥ घेत जानकीचे दर्शन ॥
सांगे सकळ वर्तमान ॥ जें जें लंकेत वर्तलें ॥६२॥
रघुपतीचें जे कां हित ॥ तें बिभीषणासी करणें अगत्य ॥
तैशीच सरमा येऊन तेथ ॥ सांभाळीत जानकीतें ॥६३॥
नाना सूक्ष्म रूप धरीत ॥ राक्षस कापट्यही जाणत ॥
तितुकें जानकीस श्रुत करित ॥ क्षणक्षणां येऊनियां ॥६४॥
असो सरमा म्हणे जानकीसी ॥ माये शोक किमर्थ करिसी ॥
राम सुखी आहे सुवेळेसी ॥ सकळ सेनेसहित पैं ॥६५॥
तुज वश करावया ये क्षणीं ॥ रावणें कृत्रिम केली करणी ॥
बरवें पाहीं विचारूनी ॥ मूळ दृष्टीं घालोनियां ॥६६॥
जनकात्मजे तव स्वयंवरी ॥ चाप बैसलें रावणाचे उरीं ॥
तें तुझ्या पतीनें झडकरी ॥ द्विखंड करूनि टाकिले ॥६७॥
त्याहूनि चाप जड ये वेळे ॥ प्रहस्तें जाऊनि कैसें आणिलें ॥
कृत्रिमधनु मुंड आणिलें ॥ निर्मून त्याचसारिखें ॥६८॥
ऐसें सरमा जों बोलत ॥ तों धनुष्य शिर जाहलें गुप्त ॥
जैसा वात लागतां अकस्मात ॥ दीप जाय विझोनी ॥६९॥
कीं जलदजालाभीतरीं ॥ इंद्रधनुष्य उमटे क्षणभरी ॥
तैसें कोदंडही झडकरी ॥ गुप्त जाहलें तेधवां ॥७०॥
असो जानकी म्हणे सरमेप्रती ॥ धन्य हो माये तुझी मती ॥
राक्षसांच्या कापट्यगती ॥ तुज समजती सर्वही ॥७१॥
मग अयोध्यापतीची राणी ॥ सरमेसी जवळी बोलावूनी ॥
हृदयीं धरीत प्रीतीकरूनी ॥ म्हणे स्वामिनी होसी लंकेची ॥७२॥
तों देववाणी जाहली अकस्मात ॥ सुखरूप आहे अयोध्यानाथ ॥
सीतेचा आनंद अद्‌भुत ॥ अंबरामाजी न समाये ॥७३॥
असो इकडे लंकापती ॥ परम चिंताक्रांत एकांतीं ॥
बोलतसे मंदोदरीप्रती ॥ तेंच श्रोतीं परिसिजे ॥७४॥
मंदोदरी परम सज्ञान ॥ पतिव्रता गुणसंपन्न ॥
जिचें सौंदर्य पाहून ॥ मीनकेतन तटस्थ ॥७५॥
मयजेचें इच्छित मन ॥ घ्यावें जानकीचे दर्शन ॥
तो मंदोदरीस दशवदन ॥ बोलता जाहला ते वेळे ॥७६॥
रावण म्हणे शुभकल्याणी ॥ तुवां जाऊनि अशोकवनीं॥
बोधोनियां जनकनंदिनी ॥ मज शयनी वश करीं ॥७७॥
तूं पतिव्रतांमाजी मंडण ॥ एवढें कार्य दे साधून ॥
तंव ते मंदोदरी हास्यवदन ॥ अश्वय म्हणोनि उठली ॥७८॥
चंद्राचे ठायीं कलंक ॥ त्याहून विशेष मयजेचें मुख ॥
अशोकवना तात्काळिक ॥ येती जाहली पतिव्रता ॥७९॥
त्रिजटा म्हणे भूमिकुमरी ॥ तव दर्शना आली मंदोदरी ॥
ऐसें ऐकतां अंतरीं ॥ परम संतोषली जगन्माता ॥८०॥
ते चातुर्यसरोवरमराळिका ॥ मयजा सुगंधचंपककळिका ॥
जैसी सिंहस्थीं जान्हवी देखा ॥ भेटों जाय गौतमीतें ॥८१॥
सीतेचिया चरणांवरी ॥ मयजा जों नमस्कार करी ॥
तो सीतेनें धरूनि झडकरी ॥ हृदयी धरिली प्रीतीनें ॥८२॥
की त्या सिता असिता ॥ एके ठायी मीनल्या तत्वतां ॥
कीं इंदिरा आणि शिवकांता ॥ एकीस एक भेटती ॥८३॥
एक शची एक सरस्वती ॥ एक कृष्णा एक गोमती ॥
एक मंदाकिनी एक भोगावती ॥ मूर्तिमंत पातल्या ॥८४॥
असो वरद भाक विसरून ॥ स्वानंदसमुद्रीं जाहल्या लीन ॥
चतुःषष्ठी अंतःकरण ॥ विरून गेलें रघुनाथीं ॥८५॥
कीं वेदशास्त्रींच्या श्रुती ॥ ऐक्यत्वीं ऐक्यास येती ॥
तैशा आलिंगोनी बैसती ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥८६॥
जे कां विषकंठवंद्यप्रिया ॥ तिजप्रति बोले दशकंठजाया ॥
आजी सुदिन म्हणोनियां ॥ दर्शन जाहलें माये तुझें ॥८७॥
क्षण एक निवांत राहून ॥ मयजा बोले सुवचन ॥
म्हणे सर्वांभूतिं समसमान ॥ रघुनंदन एक असे ॥८८॥
अनेक तरंग एक सागर ॥ बहुत घरें एक अंबर ॥
अनेक मणी एक सूत्र ॥ तैसा रघुवीर व्यापक असे ॥८९॥
एक सुवर्ण बहु अलंकार ॥ बहु तरंग एक नीर ॥
बहुत मातृका एक ओंकार ॥ तैसा रघुवीर व्यापकत्वें ॥९०॥
एक शरीर अवयव अपार ॥ बहुत पत्रें एक तरुवर ॥
बहुत जळचरें एक नीर ॥ तैसा रघुवीर व्यापक असे ॥९१॥
एक चाराचर सर्वांभूतीं ॥ तोच नांदे अयोध्यापति ॥
तरी दशमुखाची केलिया प्रीती ॥ काय स्थिति उणी होय ॥९२॥
सकळ देहीं अयोध्याधीश ॥ तरी वेगळा कां भाविसी लंकेश ॥
सीता दुराग्रह विशेष ॥ व्यर्थ कां करिसी सांग पां ॥९३॥
मयजेचा शब्द ऐकूनी ॥ हंसूनी बोले जनकनंदिनी ॥
अभेद एक चापपाणी ॥ सर्वांभूतीं भरलासे ॥९४॥
सर्वही घट मठ जाण ॥ काय फोडून घातलें गगन ॥
अभेद एक रघुनंदन ॥ दुजेपण तेथें कैंचें ॥९५॥
मायिक भासे जगडंबर ॥ जैसा मृगजळाचा मिथ्या पूर ॥
वंध्यावल्लीचें पक्व फळ विचित्र ॥ मिथ्यामय लटिकेंचि ॥९६॥
स्वप्नींची संपदा पूर्ण ॥ किंवा आरशांतील धन ॥
कीं दरिद्रियाचे मनोरथ पूर्ण ॥ मिथ्यामय सर्वची ॥९७॥
मिथ्या अलंकार एक सुवर्ण ॥ मिथ्या तरंग एक जीवन ॥
अभेद एक रघुनंदन ॥ तेथें रावण कोण कैंचा ॥९८॥
ब्रह्मानंदस्वरूपावरी ॥ न दिसे दुजेपणाची कुसरी ॥
तेथें सीता आणि मंदोदरी ॥ मिथ्याभास लटिकाची ॥९९॥
कैंची पृथ्वी कैंचे गगन ॥ कैंचें आप तेज पवन ॥
मिथ्या माया कैंचें त्रिगुण ॥ तेथें रावण कोठें आहे ॥१००॥
जितकें थोर ब्रह्मांड ॥ तैसेंच आकाश प्रचंड ॥
तेथें घट मठ हें बंड ॥ वेगळें व्यर्थ भावावें ॥१॥
तैसा निर्विकार जगजेठी ॥ न चलती द्वैतभावाच्या गोष्टी ॥
तेथें कैंची रावणाची भेटी ॥ बाह्यदृष्टी त्यजीं कां ॥२॥
मयजा म्हणे जानकीसी ॥ सर्वव्यापक अयोध्यावासी ॥
किंवा आहे एकदेशी ॥ सांग मजपाशीं निश्चयें ॥३॥
यावरी त्रिभुवनपतीची राणी ॥ बोले विदेहराजनंदिनी ॥
म्हणे त्रिपुटी गेल्या जेथें विरूनी ॥ तटस्थ वाणी निगमांची ॥४॥
ध्येय ध्याता ध्यान ॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान ॥
नुरे भजक भज्य भजन ॥ सांग रावण तेथें कैंचा ॥५॥
जें जें दिसे ते ते नाशिवंत ॥ वस्तु एक अभेद शाश्वत ॥
मंदोदरी आणि सीता तेथ ॥ कोणीकडे पहाव्या ॥६॥
दोरावर दिसे विखार ॥ शुक्तिकेचे ठायीं रजत साचार ॥
तैसाच मायेचा प्रकार ॥ मिथ्याविकार जाणपां ॥७॥
मयकन्या सावध होय ॥ दृष्टीनें सर्व पाहे अद्वय ॥
निर्विकार वस्तु निरामय ॥ हाही न साहे शब्द जेथें ॥८॥
वस्तु अव्यक्त अनाम ॥ तेथें राम हेंही न साहे नाम ॥
ऐसे जयासी कळे वर्म ॥ आत्माराम तोचि पैं ॥९॥
ऐसा जो जाहला परिपूर्ण ॥ त्यास समाधि आणि विधान ॥
बोलणें आणि मौन ॥ दोनी त्याची विरालीं ॥११०॥
ऐसें जगन्माता बोलत ॥ मयजा ब्रह्मानंदे डुल्लत ॥
समाधि ग्रासोनि तटस्थ ॥ विराला हेत सर्वही ॥११॥
बोलणें आणि संवाद ॥ खुंटोनि जाहला अभेद ॥
ओतला एक ब्रह्मानंद ॥ आनंदकंद जगद्‌गुरु ॥१२॥
आनंद जिरवून अंतरीं ॥ सावध जाहली मंदोदरी ॥
जगन्मातेचे चरण धरी ॥ सद्द अंतरी होऊनियां ॥१३॥
म्हणे संशय निरसला पूर्ण ॥ धन्य धन्य आजिचा दिन ॥
विदेहकन्येचे चरण ॥ वारंवार धरी मग ॥१४॥
ब्रह्मानंदें म्हणे श्रीधर ॥ धन्य तो दिवस साचार ॥
सत्संगें आत्मविचार ॥ सारासार होय पैं ॥१५॥
भागीरथी सर्वत्र पवित्र ॥ परी प्रयागमहिमा अपार ॥
तैसा रामविजय परिकर ॥ मंदोदरीसंवाद हा ॥१६॥
सर्वत्रां सुलभ ते भीमा ॥ परी पंढरीस अगाध महिमा ॥
स्नान करितां कर्मांकर्मां ॥ पासूनि मुक्त होईंजे ॥१७॥
असो सीतेची आज्ञा घेउनी ॥ स्वधामा गेली मयनंदिनी ॥
रावणाप्रती जाऊनी ॥ वर्तमान सांगतसे ॥१८॥
तप्तलोहावरी उदक पडलें ॥ तें माघारें निघे एकवेळे ॥
परी जानकी कदा काळें ॥ वश नव्हे तुम्हासी ॥१९॥
मृगजळी बुडेल अगस्ति ॥ तमकूपीं पडेल गभस्ति ॥
हेंही घडे परी सीता सती ॥ वश नोहे तुम्हांतें ॥१२०॥
जे गोष्टीनें होय अनर्थ ॥ आपले कुळाचा होय घात ॥
ऐशिया बुद्धीनें पंडित ॥ काळत्रयीं न वर्तती ॥२१॥
हातीचें टाकूनि सुवर्ण ॥ कां बळेंच घ्यावें शेण ॥
गोड शर्करा वोसंडून ॥ राख कां मुखीं घालावी ॥२२॥
मुक्तें सांडोनि परिकरें ॥ कां पदरीं बांधावीं खापरें ॥
वोसंडूनि रायकेळें आदरें ॥ अर्कीफळें कां भक्षावी ॥२३॥
याकरितां द्विपंचवदना ॥ सोडावी रामाची अंगना ॥
कायावाचामनें जाणा ॥ रघुनंदना शरण रिघावें ॥२४॥
परसतीचा अभिलाष ॥ महापुरुषास ठेवणें दोष ॥
बळवंतावरी बांधणें कास ॥ मग अनर्थास काय उणें ॥२५॥
विवसी हे परम सीता ॥ अनर्थकारक घोर वनिता ॥
हे नेऊन द्यावी रघुनाथा ॥ तरीच तुम्हां कल्याण ॥२६॥
महासर्प उशी घेउनी ॥ कैसा निजेल सुखशयनीं ॥
बळेंच गृहास लाविल्या अग्नि ॥ मग अनर्थासि काय उणें ॥२७॥
परद्रव्याचा अभिलाष ॥ जाणोनि प्राशन करणें विष ॥
करितां परनिंदा द्वेष ॥ मग अनर्थासी काय उणें ॥२८॥
परम साधु बिभीषण ॥ तुमचा अविवेक देखोन ॥
अयोध्यापतीस गेला शरण ॥ जन्ममरण चुकविलें ॥२९॥
परम प्रतापी रघुनंदन ॥ उदधीवरी तारिले पाषाण ॥
हा प्रताप तुम्ही जाणून ॥ द्वेषबुद्धि कां धरितां ॥१३०॥
ऐशिया शब्दसुमनेंकरून ॥ मयजेनें पूजिला रावण ॥
मग प्रत्युत्तर हांसोन ॥ देता झाला ते काळी ॥३१॥
प्रिये तूं बोलसी वचनें ॥ तीं मज मानलीं बहुत गुणें ॥
परी आपुला पुरुषार्थ टाकणें ॥ तरी जिणें व्यर्थ लोकीं ॥३२॥
चिरंजीव जाहला बिभीषण ॥ प्रळयी तरी पावेल मरण ॥
तोंवरी देहलोभ धरून ॥ बैसतां काय सार्थक ॥३३॥
कल्पपर्यंत जीवूनी ॥ पडिले शरीर बंदिखानीं ॥
या पुरुषार्थासी शुभ कल्याणी ॥ मानी कोण सांगपां ॥३४॥
आदि पुरुष रघुनंदन ॥ हें मी जाणें सर्व वर्तमान ॥
तो मजसी युद्धकामना धरून ॥ सागर उतरूनि आला आहे ॥३५॥
त्याची वासना न पुरवितां ॥ कदा माघारी नेदी सीता ॥
तरी मी आपुल्या पुरुषार्था दावोनि राघवा जिंकीन ॥३६॥
ऐसें ऐकोनि ते अवसरीं ॥ चिंताक्रांत होऊनि मंदोदरी ॥
प्रवेशली निजमंदिरी ॥ क्लेशचक्रीं पडियेली ॥३७॥
असो आतां यावरी ॥ रावण चढला गोपुरीं ॥
जैसा बलाहक पर्वतशिखरीं ॥ कृष्णवर्ण उतरला ॥३८॥
चपळेहून तेज आगळे ॥ आंगी अलंकार मिरविले ॥
दाही छत्रे ते वेळे ॥ मस्तकावरी विराजती ॥३९॥
भोंवते सेवकजन बहुत ॥ उपभोग देती समस्त ॥
इकडे बिभीषण रामासी दावित ॥ रावण गोपुरीं चढला तो ॥१४०॥
श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ हा परम उंच सुवेळागिरी ॥
अवघे वळंघोनियां वरी ॥ लंकापुरी पाहूं चला ॥४१॥
ऐसें बोलतां अयोध्याधीश ॥ उठले तत्काळ कपिपुरुष ॥
सुवेळाचळीं आसपास ॥ चढले तेव्हां वायुवेगें ॥४२॥
जैशा कनकाचळावरी ॥ चढल्या निर्जरांच्या हारी ॥
तैसा वानरांसह ते अवसरीं ॥ अयोध्याविहारी चढतसे ॥४३॥
रघुपतीचे दोनी कर ॥ धरिती बिभीषण सूर्यकुमर ॥
सुवेळाचळीं रघुवीर ॥ कैसा शोभला ते काळीं ॥४४॥
उदयाचळावरी बाळमित्र ॥ ऐरावतावरी सहस्रनेत्र ॥
कैलासावरी कर्पूरगौर ॥ त्रिभुवनेश्वर दिसे तेवीं ॥४५॥
जो लावण्यमृतसागर ॥ स्मरारिमित्र मनोहर ॥
झळकती समुद्रदत्त अलंकार ॥ चपळेहूनि तेजागळे ॥४६॥
तेणें शोभला अयोध्यानाथ ॥ दिव्य पीतवसन विराजत ॥
असो गोपुरावरी लंकानाथ ॥ विलोकित रामाकडे ॥४७॥
वानरांसहित रावणारी ॥ शोभतसे सुवेळाद्रीवरी ॥
जैसा इंद्रादि सकळ सुरवरीं ॥ वैकुंठपति वेष्टिला ॥४८॥
कीं अनंत श्रुत्यर्थ समवेत ॥ तो वेदोनारायण विराजत ॥
किंबाहुना वृक्षांसहित ॥ कल्पद्रुम विराजे ॥४९॥
तैसा महावीरीं वेष्टित ॥ शोभतसे सीताकांत ॥
परी ते समयीं सूर्यसुत ॥ कर्म अद्‌भुत करिता जाहला ॥१५०॥
कुंजर दृष्टीं देखोन ॥ उगा न राहे पंचानन ॥
कोणास न पुसतां मित्रनंदन ॥ अकस्मात उडाला ॥५१॥
वज्र पडे पर्वतशिखरी ॥ तैसा सुग्रीव ते अवसरीं ॥
येऊन आदळला रावणावरी ॥ परमावेशें करूनियां ॥५२॥
सव्यहस्तचपेटेतळीं ॥ दाही छत्रे खाली पाडिलीं ॥
वामहस्तघायें तळीं ॥ मुगुट सर्व पाडिले ॥५३॥
जैसी विंध्याद्रीवरी अकस्मात ॥ विद्युल्लता येऊन पडत ॥
तैसा अर्कजें केलें विपरीत ॥ लंकानाथ घाबरला ॥५४॥
मग लत्ताप्रहार ते वेळां ॥ सुग्रीवानें समर्पिला ॥
सवेंच हृदयीं दिधला ॥ मुष्टिघात ते वेळीं ॥५५॥
मल्लयुद्ध परम अद्‌भुत ॥ जाहलें एक घटिका पर्यंत ॥
रावण म्हणे वाळीऐसें त्वरित ॥ धरून नेईल सुग्रीव हा ॥५६॥
रामापाशी नेऊन त्वरित ॥ विंटंबील सूर्यसुत ॥
पळावयासी निश्चित ॥ मार्ग कोठे दिसेना ॥५७॥
षोडश खणांचे गोपुर ॥ तयावरूनि महावीर ॥
कोसळले तेव्हां लंकानगर ॥ गजबजिलें एकदांचि ॥५८॥
एक म्हणती आला हनुमंत ॥ नगर जाळावया समस्त ॥
एक म्हणती समुद्रांत लंका घालील पालथी ॥५९॥
असो तेव्हां दशकंधर ॥ चुकवोनियां पैं सत्वर ॥
पळाला वेगें जैसा तस्कर ॥ जागा होतां गृहस्वामी ॥१६०॥
मृगेंद्राचे कवेंतून देख ॥ पूर्वभाग्यें सुटला जंबुक ॥
कीं भुजंगकवेंतूनि मूषक ॥ पळोनि जाय स्वस्थळा ॥६१॥
असो सुग्रीव तेथोनि उडाला ॥ सुवेळागिरीं पावला ॥
एकचि जयजयकार जाहला ॥ हृदयीं धरिला रघुनाथें ॥६२॥
वृदाकर गगनींहूनी ॥ पुष्पें वर्षती ते क्षणीं ॥
धन्य सुग्रीव म्हणोनी ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥६३॥
श्रीराम सूर्यकुमरा ॥ आजी बृहस्पति चेवला विचारा ॥
तैसें तूं महावीरा ॥ केलें होतेस विपरीत ॥६४॥
समीप असतां सर्व दळें ॥ पुढें उडी न घालावी भूपाळें ॥
असो जय पावला शीघ्रकाळें ॥ हाच लाभ थोर आम्हां ॥६५॥
तेव्हां आणोनि पुष्पजाती ॥ वानरीं पूजिला किष्किंधापती ॥
दळभारेंसी सीतापती ॥ पूर्वस्थळास उतरला ॥६६॥
सकळ जुत्पत्तिंसह रघुनंदन ॥ बैसला तेव्हा सभा करून ॥
सुग्रीव आणि बिभीषण ॥ अवघे जवळी बैसले ॥६७॥
राजाधिराज रामचंद्र ॥ जो चातुर्यगुणसमुद्र ॥
राजनीति बहुविचार ॥ करिता झाला ते समयीं ॥६८॥
म्हणे आतां द्विपंचवदन ॥ सीता नेदी युद्धाविण ॥
यावरी मग बिभीषण ॥ बोलता जाहला तेधवां ॥६९॥
म्हणे साम दाम दंड भेद करून ॥ शत्रु कीजे आपणाधीन ॥
ओळखूनि समयाचेंं चिन्ह ॥ तैसें चातुरीं वर्तावें ॥१७०॥
मंत्रें आकर्षिजे विखार ॥ उदकें शांतविजे वैश्वानर ॥
वेदांतज्ञानें भवसमुद्र ॥ उतरूनि जावें पैलतीरा ॥७१॥
कामक्रोधादि शत्रु थोर ॥ विवेकें जिंकावे साचार ॥
भक्तिबळें सर्वेश्वर ॥ आपणाधीन करावा ॥७२॥
शमदमबळेंकरून ॥ मनोजय करिती सज्ञान ॥
व्यत्पुत्तीच्या बळेंकरून ॥ अर्थ काढिती पंडित ॥७३॥
पाषाणाखाली सांपडे हात ॥ तो युक्तीनें काढावा अकस्मात ॥
बळें करूनि ओढितां प्राप्त ॥ व्यथा मात्र होय पैं ॥७४॥
तैसे आधीं साम करून ॥ वश करावा द्विपंचवदन ॥
समयोचित जाणे ज्ञान ॥ ऐसा शिष्टाईस पाठवा ॥७५॥
सभेसि बैसतां जाऊन ॥ दिसे जैसा बृहस्पति प्रवीण ॥
सरस्वती जयासी प्रसन्न ॥ यमयोचित शब्द देत ॥७६॥
वेदशास्त्रपुराण ॥ हे जयासी करतलामलक पूर्ण ॥
तेजस्वी जैसा चंडकिरण ॥ सभास्थानीं तेवी दिसे ॥७७॥
जरी वरी लोटले शत्रु समस्त ॥ ते समयीं जैसा वैवस्वत ॥
जैसा कलशोद्‌भव निश्चित ॥ शत्रुसागर प्राशावया ॥७८॥
हृदय निर्मळ कपटरहित ॥ भोळा जैसा उमाकांत ॥
श्रेष्ठत्वें सभेंत विराजत ॥ शचीनाथ ज्यापरी ॥७९॥
ईश्वरीं जयाचे प्रेम ॥ संतांसी मित्रभाव परम ॥
आचरे सदा सत्कर्म ॥ क्रोध काम दवडोनीयां ॥१८०॥
यालागीं जगद्वंद्या राघवा ॥ या चिन्हीं मंडित बरवा ॥
ऐसा शिष्टाईस पाठवावा ॥ मयजाधवाजवळिकें ॥८१॥
तरी नर वानर रीस ॥ कोणास पाठवूं शिष्टाईस ॥
तुम्ही आम्हीं किष्किंधाधीश ॥ विचार एक काढावा ॥८२॥
वारणचक्रांत रिघोन ॥ स्वकार्य साधी पंचानन ॥
कीं एकलाचि जाऊन सुपर्ण ॥ अमृतकुंभ घेऊन आला ॥८३॥
एकलाच जाऊन गुरुपुत्र ॥ साधून आला संजीवनी मंत्र ॥
कीं सागर उडोनि रुद्रावतार ॥ शुद्धि करूनि पातला ॥८४॥
तैसेंचि कार्य साधून ॥ सत्वर येई परतोन ॥
ऐसा पाठवावा निवडोन ॥ शीघ्रकाळीं तत्वतां ॥८५॥
ऐसें बोलतां बिभीषण ॥ परम संतोषला रघुनंदन ॥
म्हणे धन्य तुझें ज्ञान ॥ सकळकळाप्रवीण होसी ॥८६॥
रत्‍नराशी पडल्या अपार ॥ त्यांत अनर्घ्यरत्‍न प्रभाकर ॥
परीक्षक निवडती तैसा वीर ॥ वाळिपुत्र काढिला ॥८७॥
बिभीषण म्हणे राजीवनेत्रा ॥ जलदवर्णा चारुगात्रा ॥
पद्मोद्‌भवजनका स्मरारि मित्रा ॥ अंगदासी पाठवावें ॥८८॥
हा सर्व लक्षणी आहे चतुर ॥ जैसा नवग्रहांत दिनकर ॥
कीं विखारांत धरणीधर ॥ तैसा वानरांत अंगद हा ॥८९॥
कीं शास्त्रांमाजी वेदांत ॥ शस्त्रांत सुदर्शन लखलखित ॥
कीं पक्ष्यांमाजी विनतासुत ॥ बळें उद्‌भुत तैसा हा ॥१९०॥
ऐकतां तोषला रघुनंदन ॥ म्हणे हे तुम्ही उतम निवडिलें रत्‍न ॥
तंव तो अंगद कर जोडून ॥ रघुपतीप्रति बोलत ॥९१॥
म्हणे पुराणपुरुषा परमानंदा ॥ भक्तहृत्पद्मकोशमिलिंदा ॥
जगदंकुरमूळकंदा ॥ आज्ञा काय ते मज द्यावी ॥९२॥
राजीवाक्षा रणरंगधीरा ॥ असुरकाननवैश्वानरा ॥
जनकजामाता अतिउदारा ॥ आज्ञा काय ती मज सांगा ॥९३॥
चराचरफलांकितद्रुमा ॥ विशाळभाळा पूर्णकामा ॥
अजअजित आत्मारामा ॥ आज्ञा काय ती मज सांगा ॥९४॥
रावण आणि कुंभकर्ण ॥ ये क्षणीं येथें आणूं बांधोन ॥
कीं हे लंका उचलून ॥ घालूं पालथी सागरीं ॥९५॥
ऐकोन अंगदाचे बोल ॥ संतोषला तमालनीळ ॥
म्हणे धन्य तो वाळी पुण्यशीळ ॥ अद्‌भुत बळ तयाचें ॥९६॥
कक्षेसी दाटोनि रावण ॥ चतुःसमुद्रीं केले स्नान ॥
त्याचे पोटी पुत्रनिधान ॥ बळ गहन तैसेंच तुझें ॥९७॥
तरी लंकेसी जाऊन ये समयीं ॥ रावणासी करी शिष्टाई ॥
म्हणावे जानकीस देईं ॥ सामोपचारें करूनियां ॥९८॥
तुवां मज न कळतां येऊन ॥ चोरिले जानकीचिद्रत्‍न ॥
तरी एकदा क्षमा केली पूर्ण ॥ देईं आणोनि झडकरी ॥९९॥
सीता देतांचि तात्काळ ॥ तूं लंकेसी नांदसी अचळ ॥
नाही तरी निर्मूळ कु ळ ॥ तुझें करीन निर्धारें ॥२००॥
ऐसें ऐकतां वाळिसुत ॥ नमसकारिला जनकजामात ॥
आज्ञा घेऊन त्वरित ॥ गगनपंथें उडाला हो ॥१॥
दशमुखाचे सभेआंत ॥ उतरता जाहला अकस्मात ॥
कीं वानररूपें जैसा आदित्य ॥ एकाएकीं प्रगटला ॥२॥
कीं वैकुंठाहूनि सर्पारी ॥ अवचिता येत उर्वीवरी ॥
कीं कर्मभूमीस निर्धारी ॥ योगभ्रष्ट उतरला ॥३॥
दृष्टीं देखतां अंगदवीर ॥ चमकले सभेचे असुर ॥
शस्त्रें उभारूनि समग्र ॥ सरसावले ठायी ठायी ॥४॥
म्हणती एकचि आला वानर ॥ तेणें पूर्वी जाळिलें लंकानगर ॥
सुग्रीवें गोपुरीं येऊनि समग्र ॥ छत्रे पाडिली रावणाचीं ॥५॥
हा निर्भय निःशंक बहुत ॥ एकलाचि आला सभेआंत ॥
असो चहुंकडे तारासुत ॥ पाहे न्याहाळोनि सभेतें ॥६॥
मग बोले वाळिनंदन ॥ सभेस आला जो परमस्थळींहून ॥
त्यासी न पुसती सभाजन ॥ तरी ते शतमूर्ख जाणावे ॥७॥
श़ृगालसभेत पंचानन ॥ येतां दचकती अवघेजण ॥
कीं देखतां विनतानंदन ॥ विखार जैसे दचकती ॥८॥
कीं उदया येतां दिनकर ॥ दिवाभीतें विटती समग्र ॥
कीं इंदु विलोकितां तस्कर ॥ कंटाळिती जैसे कां ॥९॥
कीं पंडित येतां सभेप्रति ॥ मनी विटती अल्पमति ॥
कीं ते कोकिळ गर्जती वसंतीं ॥ वायस मानिती संताप ॥२१०॥
दृष्टीं देखतां संतभक्त ॥ निंदक विटती समस्त ॥
तैसे तुम्ही राक्षस उन्मत्त ॥ मज देखतां त्रासलेती ॥११॥
मग सभास्तंभ पृष्ठीं घालून ॥ पुच्छासनीं बैसे वालिनंदन ॥
उंच दिसे रावणाहून ॥ तेजें करूनी विशेष ॥१२॥
म्हणे गर्विष्ठा दशवदना ॥ मी आलों असे कवण्या कारणा ॥
तें कां न पुससी मलिना ॥ कोणें विचारें सांग पां ॥१३॥
मी आहे शक्रात्मजसुत ॥ अयोध्यापतीचा असें दूत ॥
तरी मी शिष्टाईस आलों येथ ॥ अंतर तुझें पहावया ॥१४॥
याउपरी वीर अंगद ॥ रावणासी करील बोध ॥
तें संतीं परिसावें विशद ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥१५॥
रविकुलभूषण रघुवीर ॥ जो साधुहृदयपंकजकीर ॥
तो ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अभंग साचार न विटे कदा ॥१६॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ चतुर्विंशतितमोऽध्याय गोड हा ॥२१७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय पंचविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पूर्वीं क्षीरसिंधु मंथूनि ॥ चतुर्दश रत्‍नें काढिली निवडूनि ॥
तैसा रामकथार्णव शोधूनी ॥ रामविजय काढिला ॥१॥
दह्याचें पोटीं निघे नवनीत ॥ कीं स्वातीतोयापासाव मुक्त ॥
तैसा दशरथापासाव रघुनाथ ॥ महिमा अद्‌भुत तयाचा ॥२॥
कीं ज्ञानापासोनि शांति ॥ कीं शांतीपासोनि विरक्ति ॥
कीं विरक्तिपासोनि निवृत्ति ॥ पद विशेष पाविजे ॥३॥
तैसा वाल्मीकमतीचा विस्तार ॥ तो हा रामकथाब्धि साचार ॥
याचा पावावया पैल पार ॥ वक्तयासी शक्ति नव्हेंचि ॥४॥
जो पीडिला दरिद्रेंकरून ॥ त्यास मार्गीं सापडें बहुत धन ॥
परी तो यथाशक्तीकरून ॥ मोट बांधी जैसी कां ॥५॥
तैसा यथामती करून ॥ रामविजय निवडिला पूर्ण ॥
असो पूर्वाध्यायीं वालिनंदन ॥ रावणासन्मुख बैसला ॥६॥
मुकुटावरी शोभे दिव्य मणी ॥ तैसा अंगद विराजे पुच्छासनीं ॥
म्हणे दशमुखा ऐकें श्रवणीं ॥ शब्दरत्‍नें अति सुरस ॥७॥
नरदेहासी येऊन पाहीं ॥ कीर्ति उरवावी भुवनत्रयी ॥
जेणें धन्य धन्य सर्वही ॥ बहुकाळ मागें म्हणतील ॥८॥
विवेकसद्बुद्धीच्या बळें ॥ दुर्बुद्धि त्यजावी कुशळें ॥
संतसंगती रसाळें ॥ वचनें हृदयी धरावीं ॥९॥
कोणाचें हेळण न करावें ॥ दुष्ट वचन न बोलावें ॥
पराचे गुण जाणोनि बरवे ॥ परोपकार करावा ॥१०॥
ज्याची वर्तणूक देखोन ॥ संतुष्ट होती ब्राह्मण ॥
ते सदा चिंतिती कल्याण ॥ तरीच धन्य संसारीं ॥११॥
सर्वांभूतीं जगन्निवास ॥ यास्तव न कीजे कवणाचा द्वेष ॥
वर्मस्पर्शाचे शब्द सदोष ॥ सहसा कोणा न बोलावे ॥१२॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे शत्रु घालावे बाहेर ॥
नाशिवंत जाणोनि शरीर ॥ सारासार विचारिजे ॥१३॥
सकळ सत्कर्माचरण ॥ करावें वेदाधारेंकरून ॥
मी कर्ता हा अभिमान॥ सहसाही न धरावा ॥१४॥
जैसं जळावरी जलजपत्र ॥ परी न भिजे अणुमात्र ॥
तैसीं सत्कर्मे करूनि सर्वत्र ॥ न लिंपावें कोठेंही ॥१५॥
मनोजय करणी करूनी ॥ मति योजावी भगवद्‌भजनीं ॥
जगदाभास मिथ्या मानोनी ॥ आत्मस्वरूपी रमावें ॥१६॥
परधन आणि परदारा ॥ येथें चित्त न घाली राक्षसेंद्रा ॥
सद्‌भाव धरिजे बरा ॥ सद्‌गुरुवचनीं सर्वदा ॥१७॥
सत्समागमीं चित्त ठेवून ॥ दूर त्यागावे दुर्जन ॥
क्लेशकाळ आलिया पूर्ण ॥ स्वधर्माचरण न सांडावें ॥१८॥
यथान्याय राज्य करीं ॥ दुष्ट तितुकें आधीं संहारीं ॥
मग सद्‌भजनीं अहोरात्रीं ॥ तनु आपली झिजवावी ॥१९॥
शम दम उपरती ॥ दया क्षमा तितिक्षा शांती ॥
ह्या जवळी रक्षाव्या नृपती ॥ अहोरात्र प्रीतीनें ॥२०॥
भक्ति वैराग्य ज्ञान ॥ आनंद सद्विद्या समाधान ॥
हीं जवळी रक्षावीं अनुदिन ॥ आत्मप्राप्तीकारणें ॥२१॥
दैवें भाग्य विद्या होय अपार ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥
अथवा कालांतरीं आलिया दरिद्र ॥ परी धीर न सांडावा ॥२२॥
यालागीं दशमुखा अवधारीं ॥ माझी शब्दरत्‍नें हृदयीं धरीं ॥
तरी अयोध्याप्रभूसी मैत्री ॥ सर्वभावें करावी ॥२३॥
श्रीराम केवळ गुणनिधान ॥ दुजयाचे अपार दोषगुण ॥
तात्काळ जाय विसरून ॥ अंतःकरण शुद्ध सदा ॥२४॥
पराचे ऐकोनि सद्‌गुण ॥ स्वयें वाखाणी रघुनंदन ॥
एकबाण एकवचन ॥ एकपत्‍नीव्रती जो ॥२५॥
त्या रघुपतीसीं सख्य करूनि ॥ अर्पीं आतां जनकनंदिनी ॥
मग तूं अक्षयीं लंकाभुवनीं ॥ चंद्रार्कवरी नांदें कां ॥२६॥
तूं जयाचा म्हणविसी भक्त ॥ तो शिव रघुपतीसी ध्यात ॥
त्यासी वैर करितां यथार्थ ॥ स्वामिद्रोही होसी तूं ॥२७॥
सनक सनंदन सनत्कुमार ॥ मुख्य विरिंचि आणि पुरंदर ॥
हे रघुपतीचे आज्ञाधार ॥ तरी तो मित्र करीं तूं ॥२८॥
जो वेदउदयाचळींचा दिनकर ॥ जो महामायेचा निजवर ॥
तो हा अयोध्यानाथ उदार ॥ तरी तो मित्र करी तूं ॥२९॥
जो सुनीळ चिद्धनगर्भ ॥ जो अनंत ब्रह्मांडांचा आरंभ ॥
गुणसागर सीतावल्लभ ॥ तरी मित्र करीं तूं ॥३०॥
कमलोद्‌भव कमलाकार ॥ कपालधर ज्याचे अज्ञाधार ॥
तो हा जगवंद्य रघुवीर ॥ तरी तो मित्र त्वां करावा ॥३१॥
वेद शास्त्र पुराणें जाण ॥ नारदादि गाती जयाचे गुण ॥
तो हा दशशतमुखांगशयन ॥ तरी तो मित्र करीं तूं ॥३२॥
शतकोटी अपराध करून ॥ तो जरी परतोन आला शरण ॥
तरी तयावरी रघुनंदन ॥ सर्वांहून प्रीति करी ॥३३॥
भक्तिभावें अर्पितां तीळ ॥ राम मानी जैसा कनकाचळ ॥
जो भक्तांचा होऊन द्वारपाळ ॥ अंतरर्बाह्य रक्षीत पैं ॥३४॥
तरी त्या द्विपंचरथनंदना ॥ शरण जाईं द्विपंचवदना ॥
जनकजा हे मम कन्या ॥ भावूनि अर्पीं रघुत्तमा ॥३५॥
दशकंठा तूं परम सज्ञान ॥ टाकिलीं वेदांची खंडें करून ॥
करी पद्मिणीपतिकुळभूषण ॥ सखा करीं सर्वस्वे ॥३६॥
ऐसी अंगदाचीं वचनें ॥ जीं विवेकभूमीचीं निधानें ॥
कीं भक्तिसागरीची रत्‍ने ॥ दशकंठासी समर्पिलीं ॥३७॥
यावरी तो दशकंठधर ॥ परम दुर्बुद्धि अविचार ॥
घृतें शिंपिजे वैश्वानर ॥ तैसा क्षोभला ते काळीं ॥३८॥
साधूचें वर्म लक्षून ॥ छळिती जेवीं दुर्जन ॥
तैसा अंगदाप्रति रावण ॥ बोलता झाला ते काळीं ॥३९॥
म्हणे रे मर्कटा अविचारा ॥ कोणाचा तूं पालेखाइरा ॥
मज रावणासीं पामरा ॥ शिटाई करूं आलासी ॥४०॥
मशका अग्नीपुढें तृण ॥ कीं शिवापुढें पंचबाण ॥
कीं मृगेंद्रासी गुण ॥ जंबुक शिकवूं पातला ॥४१॥
मर्कटा तुझा पिता कोण ॥ तो सांगें मज लागून ॥
यावरी ताराहृदयरत्‍न ॥ प्रतिवचन देतसे ॥४२॥
माझा पिता आहे कोण ॥ तो तूं नेणसी दुर्जना अझून ॥
जेणें कक्षेंत तुज दाटून ॥ केलें स्नान चतुःसमुद्रीं ॥४३॥
मग माझे पालखीवरी देख ॥ तुज बांधिला जैसा मशक ॥
तुझ्या दाढ्या मिशा सकळिक ॥ म्यांच उपडिल्या बाळपणीं ॥४४॥
माझ्या मूत्रोदकेंकरून ॥ मशका तुझें कंटाळलें मन ॥
मग तुझा पिता येऊन ॥ भिक्षा मागे वाळीसी ॥४५॥
तुझे मुखांसी मसी लावून ॥ शिरीं पांच पाट काढून ॥
लंकेत दिधला तुज भिरकावून ॥ पायी धरून ते काळीं ॥४६॥
ऐसा शक्रसुत महाबळी ॥ तूं गुंतलासी ज्याचे कक्षेतळीं ॥
तयाचा मी सुत ये काळी ॥ शिक्षा तुज करूं आलों ॥४७॥
आतां पुससी कवणाचा दूत ॥ अयोध्यापति जो रघुनाथ ॥
तुझ्या उरावरील चाप उद्‌भुत ॥ जेणें उचलोनि मोडिलें ॥४८॥
जेणें ताटिका मर्दून ॥ वीस कोटी पिशिताशन ॥
त्यांसहित सुबाहू मारून ॥ मारीच उडविला बाणवातें ॥४९॥
तुझी भगिनी शूर्पणखा ॥ जेणें केली निर्नासिका ॥
तो सौमित्राग्रज स्मरारिसखा ॥ त्याचा दूत मी असे ॥५०॥
वधोनियां खरदूषण ॥ निष्कंटक केलें जनस्थान ॥
त्या रामपंचाननाची वस्तु चोरून ॥ घेऊन आलासी जंबुका ॥५१॥
होमशाळेंत रिघोन श्वान ॥ पळे पुरोडाश घेऊन ॥
कीं देवगृहांत मलिन ॥ हिंसक जैसा संचरे ॥५२॥
की गृहीं नसतां मुख्य धनी ॥ तस्कर रिघे कोशसदनीं ॥
तैसी जानकी उचलोनि ॥ आलासि घेऊन पतिता ॥५३॥
त्या तुज चोराचा काढीत माग ॥ सुवेळेसी आला सीतारंग ॥
तुझे आयुष्याची भरली सीग ॥ तें तूं नेणसी शतमूर्खा ॥५४॥
पुच्छीं पाय पडतां देख ॥ खवळे जैसा दंदशूक ॥
तैसा प्रतिउत्तर दशमुख ॥ अंगदासी देतसे ॥५५॥
म्हणे रे मर्कटा मी दशवदन ॥ वानरांसहित रामलक्ष्मण ॥
क्षणें टाकवीन गिळोन ॥ कुंभकर्णांतें सांगोनियां ॥५६॥
सुरांसहित सहस्रनयन ॥ बंदी घातला आकळून ॥
तेथें काय मानव रामलक्ष्मण ॥ जीतचि आणीन धरूनी ॥५७॥
गरुडें सर्पमस्तकींचा मणी ॥ नेला तो जरी देईल आणोनी ॥
तरी तुम्हांस जनकनंदिनी ॥ प्राप्त होईल माघारी ॥५८॥
गजमस्तक विदारून ॥ मुक्तें घेऊन गेला पंचानन ॥
तो भिऊन देईल जरी परतोन ॥ तरी जानकी देईन मी ॥५९॥
अरे इंद्र माळा गुंफोन ॥ नित्य देई मजलागून ॥
छत्र धरी रोहिणीरमण ॥ सहस्रकिरण दीपिका धरी ॥६०॥
रसनायक वाहे पाणी ॥ वस्त्रें धूत सदा अग्नि ॥
गृहींचा केर काढूनि ॥ लोकप्राणेश टाकीतसे ॥६१॥
ऐसा मी समर्थ दशवक्र ॥ तेथें कायसे नर -वानर ॥
मागें एक पालेखाइर ॥ चोरून लंकेत आला होता ॥६२॥
तेणें उपडितां अशोकवन ॥ आम्ही सभेस आणिलें धरून ॥
पुच्छास लावितां अग्न ॥ नगर जाळूनि पळाला ॥६३॥
तो पुन्हां भेटेल जरी वानर ॥ तरी तात्काळचि करीन चूर ॥
मग म्हणे वाळीपुत्र ॥ ऐक मशका राक्षसा ॥६४॥
तुझें असंख्य दळ संहारून ॥ टाकिले सात पुत्र मारून ॥
इंद्रजित विवरीं कोंडून ॥ अशोकवन विध्वंसिलें ॥६५॥
तैं तुझें बळ रावणा ॥ कोठें गेलें होते खळा मलिना ॥
तुज शिक्षा करावया दुर्जना ॥ पुनः मारुति आला आहे ॥६६॥
त्रिभुवनपती सीतावल्लभ ॥ जो त्रैलोक्यनगरारंभस्तंभ ॥
त्यास मनुष्य म्हणसी तूं रासभ ॥ दशमुखाचा यथार्थ तूं ॥६७॥
इतर ओहळ आणि भागीरथी ॥ वरकड गज आणि ऐरावती ॥
उच्चैःश्रवा जो सूर्यरथीं ॥ इतर अश्वांसमान नोहे ॥६८॥
खद्योत आणि चंडकिरण ॥ किंवा काग आणि सुपर्ण ॥
तैसें वानर आणि वायुनंदन ॥ नव्हती समान राक्षसा ॥६९॥
परिस आणि इतर पाषाण ॥ वरकड पशू आणि शिववहन ॥
भगणें आणि रोहिणीरमण ॥ नव्हे समान राक्षसा ॥७०॥
इतर पर्वत आणि कनकाचळ ॥ इतर किरडें आणि फणिपाळ ॥
तैसा मनुष्यासमान ॥ तमालनीळ ॥ अपवित्रा तूं केंवि म्हणसी ॥७१॥
तूं दशमुखांचा बस्त होसी ॥ शिववरें मातलासी ॥
सीतादेवी निश्चयेसीं ॥ आदिमाया भवानी ॥७२॥
रणमंडळ हें होमकुंड ॥ राक्षस आहुती पडतील उदंड ॥
शेवटीं पूर्णाहूती प्रचंछ ॥ तुझी पडेल दशमुखा ॥७३॥
तुवां केलें वेदाध्ययन ॥ जैसा रासभावरी वाहिला चंदन ॥
कीं षड्रसांमाजी नेऊन ॥ दर्वीं जेवीं फिरविजे ॥७४॥
तूं दशमुखाचें वनचर ॥ तुज वधावया पारधी रघुवीर ॥
सुवेळाचळीं समरधीर ॥ येऊन उभा ठाकला ॥७५॥
अंगदशब्द परम कठीण ॥ हृदयीं खोंचती जैसे बाण ॥
परम सक्रोधें रावण ॥ वालीनंदनाप्रति बोले ॥७६॥
म्हणे रे मर्कटा वनचरा ॥ तूं भूभार झालासि पामरा ॥
तुझा पिता मारूनि तारा ॥ सुग्रीवासी दीधली ॥७७॥
पितृसूड न घेववे तुझेनि ॥ तरी प्राण देईं समुद्रजीवनीं ॥
अथवा माझे पाठीसी येऊनी ॥ रिघे वेगी मशका रे ॥७८॥
वधोनि सुग्रीव रघुनंदन ॥ तुज किष्किंधेचें राज्य देईन ॥
तुझी माता व्यभिचारिण ॥ सुग्रीवासी तिणें वरिलें ॥७९॥
सुग्रीव आणि रघुवीर ॥ तुझे मुख्य शत्रु साचार ॥
अंगद म्हणे शक्रकुमर ॥ रामबाणें मुक्त जाहला ॥८०॥
राघवप्रसादेंकरूनी ॥ वाळी अक्षय्य सायुज्यसदनीं ॥
दशमुखा तुज ये क्षणीं ॥ शिक्षा करीन पाहें पां ॥८१॥
माझिया पाणिप्रहारेंकरूनी ॥ दशमुखें तुझी टाकीन फोडूनी ॥
तुझा पुरुषार्थ त्रिभुवनीं ॥ सर्व जाणतो अपवित्रा ॥८२॥
सहस्रार्जुनाचे बंदी जाऊन ॥ पडला होतासि तूं कित्येक दिन ॥
तो तूं आजी येथें वदन ॥ दाखवितां न लाजसी ॥८३॥
मग बळीचे गृहा जाऊन देखा ॥ बंदीं पडिलासि तूं मशका ॥
तेथे तुज दासी झेलती कीटका ॥ कक्षेसीं दाटिती घडी घडी ॥८४॥
ऐसा पुरुषार्थी तूं देख ॥ न लाजसी दावितां मुख ॥
तुझे छेदावया दहाही मस्तक ॥ रघुवीर सिद्ध जाहलासे ॥८५॥
ऐसें ऐकोनि दशकंधर ॥ द्विजपंक्तीनें चावी अधर ॥
सवेगे ओढिलें शस्त्र ॥ विद्युत्प्राय ते काळीं ॥८६॥
सेवकांसी म्हणे दशकंठ ॥ धरारे वेगीं मर्कट ॥
तों चौघे राक्षस बळकट ॥ धांवोनियां धरिते जाहले ॥८७॥
अंगद दंडी दृढ धरिला ॥ वाळिपुत्रें देखोनि तेवेळां ॥
अद्‌भुत पराक्रम प्रकट केला ॥ क्षणमात्र न लागतां ॥८८॥
कृतांतकिंकाळीसमान ॥ हाकेसरसे गाजवी गगन ॥
रावणाचे हृदयी पूर्ण ॥ पुच्छघाय दिधला ॥८९॥
रावण मस्तकींचा मुकुट तेजाळ ॥ पदांगुष्ठें उडविला तात्काळ ॥
ऊर्ध्व उडाला सबळ ॥ मंडपमस्तकी बैसला ॥९०॥
चौदा गांवें जो विस्तीर्ण ॥ प्रभेस उणा चंडकिरण ॥
तो घेऊन वाळिनंदन ॥ गेला क्षण न लागतां ॥९१॥
भुजीं जडले चौघेजण ॥ त्यांचे अंतराळी गेले प्राण ॥
लोंबती प्रेते होऊन ॥ वाळिनंदन जातसे ॥९२॥
आला देखोनि वाळिसुत ॥ आश्चर्य करी जनकजामात ॥
अंगद उतरला अकस्मात ॥ कपिनाथ हर्षले ॥९३॥
दंडीची प्रेतें सोडवूनी ॥ मंडप तेव्हां ठेविला धरणी ॥
त्रिभुवनपतीचे चरणीं ॥ मस्तक अंगद ठेविला ॥९४॥
प्रीतीनें येऊनि मिलिंद ॥ सेवी पद्मकोशींचा सुगंध ॥
तैसाच वीर अंगद ॥ रघुवीरपदाब्जीं मीनला ॥९५॥
मग तो जगदानंदकंद ॥ आलिंगी हृदयीं प्रेमें अंगद ॥
सकळ कपींसी आनंद ॥ वाळिपुत्रासी भेटतां ॥९६॥
रावणाचा मुकुट तेवेळां ॥ अंगदें रामापुढें ठेविला ॥
तो बिभीषणाचे मस्तकीं घातला ॥ दशरथात्मजें ते वेळीं ॥९७॥
अंगदास म्हणे रघुनंदन ॥ मंडप येथें आणिला उचलोन ॥
पुढें कोठें बैसेल बिभीषण ॥ सिंहासन घालूनियां ॥९८॥
ऐसें वाळिसुतें ऐकोनी ॥ मंडप उचलिला ते क्षणीं ॥
शेष मस्तकीं धरी अवनी ॥ तैसा घेऊन जातसे ॥९९॥
जेथींचा तेथें मंडप ठेविला ॥ सुवेळेसी परतोन आला ॥
राक्षससमुदाय ते वेळां ॥ आश्चर्य परम मानित ॥१००॥
केवढा पुरुषार्थ करूनी ॥ राक्षसेंद्रासी गांजोनी ॥
मंडप गेला घेउनी ॥ सवेंच आणून ठेविला ॥१॥
असो राघवापुढें वाळिनंदन ॥ सांगे लंकेचें वर्तमान ॥
नानापरी बोधिला रावण ॥ परी तो नेणें दुष्टात्मा ॥२॥
गिरिमस्तकीं वर्षें जलधर ॥ परी तेथे न राहे अणुमात्र नीर ॥
तैसा बोधिला दशकंधर ॥ स्थिर नोहे बोध तेथें ॥३॥
नित्य दुग्धें न्हाणिला वायस ॥ परी तो कदा न होय राजहंस ॥
दह्यांमाजी कोळसा बहुवस ॥ घालितां उजळ नव्हेचि ॥४॥
सिकता शिजविली बहुकाळ ॥ परी ते कदा नव्हे मवाळ ॥
कीं परीस नेऊन तात्काळ ॥ खापरासी व्यर्थ लाविला ॥५॥
जन्मांधापुढें दीप जाणा ॥ कीं बधिरापुढें वाजविला रुद्रवीणा ॥
सारासार समजेना ॥ शतमुर्खा जैसा कां ॥६॥
कीं शर्करेमाजी नेऊन ॥ कडू दुधिया ठेविला बहुदिन ॥
परी त्याचें अंतर पूर्ण ॥ गोड नव्हे अणुमात्र ॥७॥
षोडशोपचारें पूजिलें प्रेत ॥ परी ते गेलें जैसे व्यर्थ ॥
तैसा बोधिला लंकानाथ ॥ परी तो नायक सर्वथा ॥८॥
जोंवरी शशी चंडकिरण ॥ तोंवरी केला राजा बिभीषण ॥
एकवचनी तूं सीतारमण ॥ तुझें वचन व्यर्थ नव्हे ॥९॥
युद्ध केलियावांचोनी ॥ कदा नेदी जनकनंदिनी ॥
राघवेंद्रें ऐसे ऐकोनी ॥ चंड दोर्दंड पीटिले ॥११०॥
जैसा रजनी अंतीं वासरमणी ॥ अकस्मात पूर्वेस देखिजे जनीं ॥
तैसी कोदंडाची गवसणी ॥ नरवीरोत्तमें काढिली ॥११॥
कीं ते मेघांतूनि वेगळी ॥ प्रळयचपळा निवडिली ॥
तैसी गवसणी काढितां प्रभा पडली ॥ कोदंडाची अकस्मात ॥१२॥
क्षण न लागतां चढविला गुण ॥ उभा ठाकला सीतारमण ॥
ओढी ओढितां आकर्ण ॥ थरथरिली सप्त द्वीपें ॥१३॥
काळाचे मनीं बैसे दचक ॥ तैसी सुग्रीवें दिधली हांक ॥
अठरा पद्में वानर देख ॥ गर्जना करीत उठले पैं ॥१४॥
बाहात्तर कोटी रीस ॥ हाकेसरिसे भरिती आकाश ॥
पृथ्वी डळमळितां नागेश ॥ ग्रीवा खालीं सरसावी ॥१५॥
दिग्गजांची बैसली टाळीं ॥ कूर्मपृष्ठी तेव्हां थरथरली ॥
यज्ञवराह पृथ्वी तळीं ॥ सांवरीत दंतानें ॥१६॥
एकदांचि कपीचे भुभुःकार ॥ ऐकतां दचकले निर्जर ॥
धुळीनें दिशा दाटल्या समग्र ॥ मेरुमांदार कांपती ॥१७॥
वीस कोटी वानर घेऊन ॥ लंकेवरी धांवला सुषेण ॥
जेवीं वारणचक्रावरी पंचानन ॥ गर्जत धांवे निःशंक ॥१८॥
सकळ पापासी रामनाम ॥ जैसें जाळूनि करी भस्म ॥
तैसा तो वानरोत्तम ॥ अंजनीतनय धांविन्नला ॥१९॥
सकळ वानरेसीं सेनापति ॥ नीळ धांविन्नला समीरगती ॥
धुळीनें लोपला गभस्ती ॥ वाटे कल्पांत मांडला ॥१२०॥
झाला एकचि हाहाःकार ॥ गजबजिलें लंकानगर ॥
वेळा सांडोनि नदेश्वर ॥ बुडवूं पाहे उर्वीतेंं ॥२१॥
उदकावरी तुंबिनीफळ ॥ तैसें डळमळे भूमंडळ ॥
वरी आसुडती निराळ ॥ भगणें भडभडां रिचवती ॥२२॥
मेरूऐसे लंकेचे हुडे ॥ वरी रचिले शस्त्रांचे जुंबाडे ॥
प्रळयविजूचेनि पाडें ॥ नग्न शस्त्रें झळकती ॥२३॥
लंकादुर्गावरी सत्वर ॥ बळें चढती प्रतापशूर ॥
केशीं धरूनि रजनीचर ॥ आसुडोनि खालीं पाडिती ॥२४॥
उल्हाटयंत्रांचे भडिमार ॥ कोट्यनकोटी करिती असुर ॥
भिंडिमाळा शस्त्रें अपार ॥ राक्षस वरून भिरकाविती ॥२५॥
कोट्यनकोटी पर्वत थोर ॥ एकदांच झोंकिती वानर ॥
वरिले यंत्रे होती चूर ॥ रजनीचरांसहित पैं ॥२६॥
दुर्गावरूनि राक्षस पाहीं ॥ वानर झोडिती शस्त्रघाईं ॥
दुर्गपरिघ ते समयीं ॥ राक्षसप्रेतांनी बुजियेले ॥२७॥
पुच्छ दोराकार टाकोनी ॥ असुरांचे ग्रीवेस गोवुनी ॥
एकदांच पाडिती आसुडोनि ॥ खंदकामाजी प्रेतवत ॥२८॥
एक अकस्मात् वानर उडोनी ॥ राक्षसांस पायीं धरूनी ॥
गरागरां भिरकाविती गगनीं ॥ आपटोनि धरणी मारिती ॥२९॥
एक राक्षसांचीं पोटें फोडिती ॥ एक चरणकरनासिकें तोडिती ॥
एक प्रेत उचलोनि मागुती ॥ भिरकाविती लंकेत ॥१३०॥
आटले बहुत रजनीचर ॥ गोपुरावरूनि दशकंधर ॥
विलोकित दिशा अंबर ॥ तो वानरमय दिसतसे ॥३१॥
स्वसैन्यासी दशकंधर ॥ म्हणे काय पाहतां निघा बाहेर ॥
आटोनि समस्त वानर ॥ माजवा समरभूमि वेगें ॥३२॥
चतुरंग दळसागर ॥ निघे लंकेतून बाहेर ॥
कोट्यनकोटी असुर ॥ पाईंचे पुढे तळपती ॥३३॥
पर्वतासमान रजनीचर ॥ विक्राळ तोडें भाळी शेंदुर ॥
बाबरझोटी दाढी शुभ्र ॥ जिव्हा आरक्त लळलळित ॥३४॥
खदिरांगार लखलखित ॥ तैसे नेत्र त्यांचे आरक्त ॥
मद्यपानें झाले मस्त ॥ शस्त्रें घेऊन तुळती ॥३५॥
सुरांची शिरे रेखूनी ॥ ब्रीदे बांधिली चरणीं ॥
यमदंष्ट्रा झळकती जधनीं ॥ आवेशेंकरून गर्जती ॥३६॥
वोडण असिलता शक्ति ॥ शूळ तोमर घेऊनि हातीं ॥
गदा परिघ चक्रें झळकती ॥ दंडीं पिंजारिती चामरें ॥३७॥
वानरांचे करून पुतळे ॥ रुळत चरणीं घातले ॥
हांका देती परम बळें ॥ एकदांचि सर्वही ॥३८॥
दणाणत उर्वीमंडळ ॥ म्हणती देवांनो धांवा सकळ ॥
तुमच्या रामासहित दळ ॥ रणांगणीं ग्रासिलें ॥३९॥
तयांपाठीं अश्वभार ॥ नानाजातीचें मनोहर ॥
वरी बैसले राऊत असुर ॥ असिलता घेऊनियां ॥१४०॥
तयांपाठी गजभार ॥ ऐरावती समान थोर ॥
वरी शूळ घेऊनि बैसले असुर ॥ ध्वजीं अंबर भेदिती ॥४१॥
तयां पाठीसी चालिले रथ ॥ रत्‍नजडित चाकें झळकत ॥
तुरंग जुंपिले चपळ बहुत ॥ गगनचुंबित ध्वज बहु ॥४२॥
संग्राम संकेत भेरी ॥ असुरीं ठोकिल्या ते अवसरीं ॥
रणातुरें आणि मोहरी ॥ तेथें धडकती विशाळ ॥४३॥
वैरियांचीं आणि स्वदळें ॥ एकवटलीं दोन्ही दळें ॥
एकचि घनचक्र मांडिलें ॥ नादें कोंदलें अंबर ॥४४॥
जय यशस्वी अयोध्यानृपवर ॥ म्हणोनि धांवती वानरवीर ॥
वृक्षाघायें रजनीचर ॥ झोडोनि समरीं पाडिती ॥४५॥
कृतावंत धांवती वानर ॥ टाकिती पर्वत पाषाण अपार ॥
असुरांचे अस्थिपंजर ॥ चूर होती लागतां ॥४६॥
उठावले राक्षस बळें ॥ तोडिती कपींचीं शिरकमळें ॥
कीं उसळती नारिळें ॥ कोट्यनकोटी आकाशीं ॥४७॥
जैसीं इक्षुदंडांचीं खंडें ॥ तैसीं करचरणांचीं दुखंडें ॥
एकदांच पडती प्रचंडें ॥ असुरहस्तें करूनियां ॥४८॥
खेटकाआड असुर दडती ॥ कुंतशक्तीनें बळें खोंचिती ॥
वानरां विदारून पाडिती ॥ ठायीं ठायीं असंख्य ॥४९॥
अकस्मात कपि धांवती ॥ काळिजे राक्षसांचीं काढिती ॥
प्रेते तेथें पडलीं किती ॥ नव्हे गणती कोणातें ॥१५०॥
आवेशें कपि शिळा टाकिती ॥ असुरांचे मुखांवरी आदळती ॥
रक्ते भडाभडां उसळती ॥ मस्तकें उडती तडतडां ॥५१॥
उर्ध्वपंथें शिरें उडती ॥ स्वर्गपंथा भेदीत जाती ॥
नाशिवंत म्हणोनि उतरती ॥ सीतापति पाहावया ॥५२॥
समरभूमीसीं धडें नाचती ॥ दोनी हस्तें टाळी वाजविती ॥
आम्हांसी येथेंचि आहे गती ॥ नृत्य करिती म्हणूनियां ॥५३॥
रणीं भ्याड जे तयांप्रती ॥ तुटली शिरें गदगदां हांसती ॥
आम्ही पावलो मोक्षगती ॥ तुम्हांस नाही हो सर्वथा ॥५४॥
असो वानरवीर प्रचंड ॥ तों गजभार लोटलें उदंड ॥
कपी ओढूनि शुंडादंड ॥ आकाशपंथें भोवंडिती ॥५५॥
गजदंत मोडोनि लवलाहें ॥ वरिल्या ताडिती त्याचि घायें ॥
शुंडा मिळोनियां पाहें ॥ कुंभस्थळें फोडिती ॥५६॥
पुच्छीं धरूनियां वारण ॥ गगनीं देती भिरकावून ॥
त्याचें लक्ष वेधून ॥ दुसरा गज भिरकाविती ॥५७॥
ऐसे लक्षांचे लक्ष वारण ॥ गगनीं करिताती भ्रमण ॥
एक तुरुंग पायी धरून ॥ स्वारांसहित आपटिती ॥५८॥
वृक्षमंडित पर्वत ॥ रथांवरी टाकिती अकस्मात ॥
रथ सारथियांसमवेत ॥ पिष्ट होती तया घायें ॥५९॥
असो तीन रात्री तीन दिवस ॥ युद्ध झालें आसमास ॥
सुरांचे अवतार किंपुरुष ॥ लोटिले राक्षस माघारे ॥१६०॥
ऐसें देखोनि वीर धूम्राक्ष ॥ रथारूढ धांवे रणदक्ष ॥
तेणें निजबाणीं लक्षानुलक्ष ॥ वानरवीर पाडिलें ॥६१॥
शिळा पर्वत एकसरी ॥ कपि टाकिती धूम्राक्षावरी ॥
परी तो चपळ बाणधारी ॥ पिष्ट करूनि टाकित ॥६२॥
असंख्यात वानरगण ॥ धूम्राक्षें मारिले न लागतां क्षण ॥
कपीचें भार पळोन ॥ पराजय पावले ॥६३॥
उणें देखतांचि सत्वर ॥ वेगे धांवला रुद्रावतार ॥
उचलोनियां गिरिवर ॥ धूम्राक्षावरी टाकिला ॥६४॥
अश्व सारथी रथ चूर्ण ॥ पर्वताखालीं जाहले जाण ॥
धूम्राक्ष चपळ उड्डाण ॥ करूनि गेला एकीकडे ॥६५॥
मग शूळ घेऊनि ते अवसरी ॥ धूम्राक्ष धांविन्नला मारुतीवरी ॥
मारावया सर्पारी ॥ अळिका जैसी चपेटे ॥६६॥
वारणावरी धांवे मृगेंद्र ॥ तैसा आवेशें वायुपुत्र ॥
मुष्टिघातें त्याचें शिर ॥ मृत्तिकाघटवत चूर्ण केले ॥६७॥
गजासी पर्वतपात जाहला ॥ कीं महावृक्ष उन्मळिला ॥
तैसा धूम्राक्ष पडिला ॥ गतप्राण होऊनियां ॥६८॥
धूम्राक्ष पडतांचि तात्काळ ॥ पळों लागलें घायाळ ॥
जैसें मन आकळितां बळ ॥ इंद्रियांचें न चले कांहीं ॥६९॥
जेथोनि मन उडे निश्चितीं ॥ तेथें कैंची राहिली प्रीती ॥
कीं देखणियाची गती ॥ नेत्र गेलिया मावळे ॥१७०॥
तैसा धूम्राक्ष पडतां ते काळीं ॥ घायाळें लंकेत प्रवेशलीं ॥
रावणें वार्ता ऐकिली ॥ हृदयीं वाढली परम चिंता ॥७१॥
मग दळभारेंसी वज्रदंष्ट्री ॥ दशमुख तयासी आज्ञा करी ॥
तो समरभूमीसी झडकरी ॥ येता झाला वातवेगें ॥७२॥
वानर राक्षस ते समयीं ॥ मिसळल एके ठायीं ॥
वानवीरों राक्षस महीं ॥ प्रेतें करूनि पाडिलें ॥७३॥
रथारूढ वज्रदंष्ट्री ॥ हरिदळीं मिसळला झडकरी ॥
दोन लक्ष कपि भूमीवरी ॥ प्रेतें होऊन पडियले ॥७४॥
ऐसें देखोनि वाळीसुत ॥ वेगें धांवला कृतांतवत ॥
शतांची शतें पर्वत ॥ उचलोनि टाकी अरीवरी ॥७५॥
पर्वतासरी ते क्षणीं ॥ राक्षस मारिले एक अक्षौहिणी ॥
अशुद्धेंकरूनि धरणीं ॥ पूर वाहाती भडभडां ॥७६॥
मग तारातनयें ते अवसरीं ॥ उचलिला बहुश़ृगांचा गिरी ॥
भिरकाविला वज्रदंष्ट्रीवरी ॥ परमावेशें तेधवां ॥७७॥
तों राक्षसें सोडोनियां बाण ॥ क्षण न लागतां केला चूर्ण ॥
ऐसें अंगदें देखोन ॥ महावृक्ष उन्मळिला ॥७८॥
परम प्रतापी वाळीनंदन ॥ भुभुःकारें गर्जवीत गगन ॥
वृक्षघायासरसा प्राण ॥ वज्रदंष्ट्रीचा घेतला ॥७९॥
शरीर जाहलें शतचूर्ण ॥ मही भिजली अशुद्धेकरून ॥
जैसा रगडितां मत्कुण ॥ न उरेच कांही उरी ॥१८०॥
तों अकंपनदळभारें करून ॥ रणासी आला न लागतां क्षण ॥
तेणें सोडिले असंख्यबाण ॥ कपिचक्रावरी पैं ॥८१॥
सिंहचपेटे देखोनि वारण ॥ तेंवि पातला सीताशोकहरण ॥
वृक्षघातें करून ॥ रणी अकंपन विदारिला ॥८२॥
राक्षसदळीं हाहाकार ॥ शोकार्णवीं मग्न दशकंधर ॥
मग तयास शांतवी ज्येष्ठ कुमर ॥ शक्रजित नाम जया ॥८३॥
म्हणे राया तूं चिंता न करीं ॥ तुझे शत्रु समरभूमीवरी ॥
आजि पहुडवीन निर्धारी ॥ शक्रजित तरी नाम ॥८४॥
नाहीं तरी मी जैसा जंत ॥ पोटासी आलों यथार्थ ॥
मग असंख्य दळासहित इंद्रजित ॥ जनका नमोनि निघाला ॥८५॥
असंभाव्य सेनासागर ॥ रणमंडळासी आला सत्वर ॥
तंव ते अपार वानर वीर ॥ रणपंडित प्रतापी ॥८६॥
घेऊन शिळा तरुवर ॥ असुरांत मिसळले वानर ॥
जैसें वायसांमाजी सुंदर ॥ राजहंस मिसळले ॥८७॥
किंवा गारांमाजी हिरे ॥ मिसळती जैसें एकसरें ॥
तैसे वानर प्रतापें थोरें ॥ असुरदळीं चौताळती ॥८८॥
कपींचा प्रताप आगळा ॥ देखोनि इंद्रजिते रथ लोटिला ॥
तों वाळीपुत्र धांविन्नला ॥ महापर्वत घेऊनियां ॥८९॥
जंबुमाळी प्रतापी वीर ॥ त्यावरी धांवला वायुकुमर ॥
विद्युन्माळी यावरी श्वशुर ॥ सुग्रीवाचा उठावला ॥१९०॥
जंधनामें असुर प्रबळ ॥ त्यावरी धांवे वीर नळ ॥
परम मांडलें रणमंडळ ॥ हांकें निराळ गर्जतसे ॥९१॥
वानरराक्षसांचीं प्रेतें ॥ एके ठायीं पडलीं अगणितें ॥
जैसे खडे आणि मुक्तें ॥ एकें ठायीं विखुरलीं ॥९२॥
हनुमंतें पायांतळीं ॥ घालोनि चिरिला जंबुमाळी ॥
विद्युन्माळी ते काळीं ॥ सुषेणें आपटोनि मारिला ॥९३॥
नीळें जंध मारिला ते क्षणीं ॥ तो अस्ता गेला वासरमणी ॥
अंधारें कोंदली रजनी ॥ कोणासी कोणी न देखे ॥९४॥
कोणरे कोण असुर पुसत ॥ कपि म्हणती आम्ही रामदूत ॥
असुरवीर अकस्मात ॥ घाय हाणिती सरिसाचि ॥९५॥
कोणरे कोण पुसती वानर ॥ जे म्हणती आम्ही असुर ॥
घायें हाणोनी कपिवर ॥ करिती चूर राक्षसांचा ॥९६॥
सवेंच उदय पावे अत्रिपुत्र ॥ आनंदले सकळांचे नेत्र ॥
परी वानरवीर अनिवार ॥ आटिले असुर पराक्रमें ॥९७॥
मग तो शक्रजित तो वेळां ॥ रथासहित सेनेंतून उडाला ॥
जलदजाळांत लपाला ॥ वर्षों लागला सर्पबाण ॥९८॥
राक्षसांचें कापट्य अद्‌भुत ॥ बाण तेच सर्प होत ॥
कपींचे अंगीं संचरत ॥ विकळ पडती वीर तेणें ॥९९॥
मग रामलक्ष्मणावरी ॥ सर्पबाण सोडी शक्रारी ॥
अयोध्यानाथ ते अवसरीं ॥ चहूंकडे पाहे तटस्थ ॥२००॥
म्हणे बाण येतात कोठुनी ॥ संधानकर्ता न दिसे नयनीं ॥
जरी प्रगट दिसे समरांगणीं ॥ तरी बाणी वरी फोडोन ॥१॥
ओढवलें परम दुस्तर ॥ कित्येक उडाले ऊर्ध्व वानर ॥
शोधिलें बहुत अंबर ॥ परी तो वीर दिसेना ॥२॥
वानर आले परतोन ॥ अवघे पाहाती म्लानवदन ॥
रामलक्ष्मणासी बाण ॥ बहुसाल खडतरले ॥३॥
ते समयीं मूर्च्छा येऊन ॥ भूमीवरी पडले दोघेजण ॥
तों इंद्रजित बोले वरून ॥ कां निवांत राहिलां ॥४॥
मारूनियां दूषण खर ॥ शिळीं बांधिला सागर ॥
म्हणवितां क्षत्रिय राजकुमार ॥ कां रे शर सोडाना ॥५॥
वरकड कपींवर बाण ॥ शक्रजितें टाकिले वरून ॥
तरू उन्मळती मुळींहून ॥ हरिगण तैसे पडियेले ॥६॥
किंशुक फुलतां बहुत ॥ सिंदुरवर्ण दिसे पर्वत ॥
तैसीं कपींची शरीरें आरक्त ॥ असंख्यात पडियेली ॥७॥
शक्रजित खालीं उतरून ॥ मुख्य जे पडले राक्षसगण ॥
त्यांचीं कुणपें उचलून ॥ लंकेसी नेता जाहला ॥८॥
जयवाद्यांचा होतां घोष ॥ परम आनंदला लंकेश ॥
हृदयीं आलिंगोनि पुत्रास ॥ म्हणे धन्य मी तुझेनि ॥९॥
त्रिजटेस म्हणे रावण ॥ पुष्पकीं सीतेसी बैसवून ॥
दृष्टीस दावीं सकळ रण ॥ रामसौमित्रांसमवेत ॥२१०॥
त्यांचीं विलोकितां प्रेतें ॥ मग ती वश होईल आम्हांतें ॥
अवश्य म्हणोनी जानकीतें ॥ विमानीं बैसवी त्रिजटा ॥११॥
सकळ मंडळ विलोकित ॥ तों अनुजासहित रघुनाथ ॥
दृष्टी देखतां मूर्च्छित ॥ जनकात्मजा पडियेली ॥१२॥
मग त्रिजटेनें सीता धरूनी ॥ उठवोनि बैसविली सांवरूनी ॥
म्हणे माये धैर्य धरी मनीं ॥ चापपाणि उठेल आतां ॥१३॥
तंव ते बिभीषणाची राणी ॥ सरमा जवळी गुप्त येउनी ॥
विदेहतनयेचे कर्णीं ॥ निजगुज सांगतसे ॥१४॥
म्हणे जगन्माते धरी धीर ॥ आता उठतील रामसौमित्र ॥
संहारितील सकळ असुर ॥ आन विचार येथें नाही ॥१५॥
मी अनृत बोलेन साचार ॥ तरी माझें खालीं पडेल शिर ॥
माझे पूर्वज अपार ॥ नरक भोगितील आकल्पवरी ॥१६॥
त्रिजटा म्हणे जानकीसी ॥ माते चिंता न करी मानसीं ॥
पुष्पक अशोकवनासी ॥ वेगेंकरून पातले ॥१७॥
सीतेस बैसवून स्वस्थानीं ॥ करी मानसीं ॥
पुष्पक अशोकवनासी ॥ वेगेंकरून पातलें ॥१७॥
सीतेस बैसवून स्वस्थानीं ॥ त्रिजटा सांगे रावणालागुनी ॥
म्हणे सीतेचिया सत्वा हानी ॥ कल्पांतीही नव्हेचि ॥१८॥
मग त्रिजटा परतोनि ॥ सीतेपासी बैसें येऊनी ॥
जैसी चित्तवृत्ति मुरडोनी ॥ स्वरूपीं पावे विश्राम ॥१९॥
सरमा म्हणे जनकनंदिनी ॥ तूं चिंता कांही न करी मनी ॥
पुराणपुरुष चापपाणी ॥ त्याची करणी जाणसी तूं ॥२२०॥
आपुला प्रताप विशेष ॥ वाढवावया अयोध्याधीश ॥
आधीं शत्रूस दिधलें यश ॥ कांही एक आरंभी ॥२१॥
हे ब्रह्मांड सकळिक ॥ बाणीं जाळील रघुनायक ॥
तेथें इंद्रजित मशक ॥ उशीर काय वधावया ॥२२॥
रावण कुंभकर्ण इंद्रजित ॥ तोचि ही बाहुलीं निर्मित ॥
खेळ मांडिला जो अद्‌भुत ॥ जाणसी समस्त तुझें तूं ॥२३॥
निशा संपतां चंडकिरण ॥ उगवे की नुगवें म्हणोन ॥
या चिंतेचें कारण ॥ कांही नाही जाणपां ॥२४॥
करितां रामनामस्मरण ॥ पापें जाती न जाती जळोन ॥
या संदेहाचें कारण ॥ कांहीच नसे जाण पां ॥२५॥
हृदयीं प्रगटतां शुद्ध ज्ञान ॥ चुके कीं न चुके जन्ममरण ॥
या चिंतेचें कारण ॥ काहीच नाही जाण पां ॥२६॥
क्षमा शांति धरितां जाण ॥ कलह होय न होय म्हणोन ॥
या चिंतेचें कारण ॥ कांहीच नाही जाण पां ॥२७॥
अयोध्यानाथ रघुनंदन ॥ यासी जय कीं अपजय म्हणोन ॥
या चिंतेचें कारण ॥ कांहीच नसे जाणपां ॥२८॥
ज्या रामाचे करितां स्मरण ॥ भक्त पावती जयकल्याण ॥
तो जगदानंद पूर्ण ॥ विजयी असे जानकी ॥२९॥
असो इकडे बिभीषण ॥ सूर्यसुतासी बोले वचन ॥
म्हणे राक्षस पर्वत आणून ॥ रामावरी टाकितील ॥२३०॥
उदय पावे जंव गभस्ती ॥ तंव जतन कराव्या दोनी मूर्ति ॥
बोल बोलतां अश्रु स्रवती ॥ रावणानुजाचे तेधवां ॥३१॥
मग जिवंत होते जे वानर ॥ त्याही पुच्छमंडप करूनि सत्वर ॥
दोन्ही स्वरूप सुकुमार ॥ रक्षिली तेव्हां अंतरीं ॥३२॥
कीं पुच्छेपेटी करून ॥ ब्रह्मादि देवांचे देवतार्चन ॥
वानर बैसले सांठवून ॥ सभोंवते सद्रद ॥३३॥
सूर्यवंशमंडण दशरथ ॥ त्याचे महत्पुण्याचा पर्वत ॥
तो वानरीं वेष्टूनि बहुत ॥ चिंताक्रांत बैसले ॥३४॥
मारुति बिभीषण रण शोधित ॥ तों महावीर पडले बहुत ॥
एक नेत्र उघडोनि पुसत ॥ बिभीषणाप्रती ते काळीं ॥३५॥
म्हणती या चराचराचें जीवन ॥ तो सुखी आहे कीं रघुनंदन ॥
सद्रद होऊन बिभीषण ॥ म्हणे चिंता न करावी ॥३६॥
तों घायें जांबुवंत विव्हळत ॥ बिभीषणासी जवळी बोलावित ॥
पुसे क्षेम आहें की रघुनाथ ॥ पुराण पुरुष जगदात्मा ॥३७॥
स्फुंदस्फुंदोनि सांगे बिभीषण ॥ नागपाशीं बांधिले दोघेजण ॥
तों मूर्च्छना सांवरून सुषेण ॥ नेत्र उघडोनि बोलत ॥३८॥
म्हणे द्रोणाचळीं औषधी बहुत ॥ जरी कोणी आणील बळवंत ॥
तरी रामसौमित्रांसहित ॥ दळ अवघें उठवीन ॥३९॥
मग बोले बिभीषण ॥ ऐसा बळिया आहे कोण ॥
रात्रीमाजी जाऊन ॥ औषधी येथें आणील ॥२४०॥
जांबुवंत बोले वचन ॥ एक सीताशोकहरण ॥
त्यावांचूनि गिरी द्रोण ॥ आणूं कोणी शकेना ॥४१॥
मग सुषेण आणि जांबुवंत ॥ बिभीषण तयांसी हातीं धरित ॥
श्रीरामापाशीं बोलत बोलत ॥ येते जाहले तेधवां ॥४२॥
तंव रण शोधूनि हनुमंत ॥ तोही तिकडोनि आल त्वरित ॥
याउपरि किष्किंधानाथ ॥ बोलता जाहला ते काळीं ॥४३॥
म्हणे रामसौमित्रांसी उचलून ॥ जा तुम्ही किष्किंधेसी घेऊन ॥
मी रावणा सहकुळीं मारून ॥ घेऊन येईन जानकी ॥४४॥
राज्यीं स्थापीन बिभीषण ॥ बंदींचे सोडवीन सुरगण ॥
राहूं मी आणि वायुनंदन ॥ सर्वीं परतोन जावें आतां ॥४५॥
तेव्हां आकाशीं वदे देववाणी ॥ आतांचि उठेल चापपाणी ॥
नेत्र उघडिले तये क्षणीं ॥ अयोध्याधीशें सत्वर ॥४६॥
भोंवतें पाहे राघवेश ॥ तों निकट बैसले निजदास ॥
मानस वेष्टोनि राजहंस ॥ बैसती जैसें प्रीतीनें ॥४७॥
कीं कमळवेष्टित भ्रमर ॥ कीं अहिवेष्टित मलयागर ॥
कीं दिव्यमुक्ताभोंवतें चतुर ॥ परीक्षक जेंवी मिळती ॥४८॥
असो सुग्रीवास म्हणे रघुनंदन ॥ बारे तूं आपुला दळभार घेऊन ॥
किष्किंधेसी जाई परतोन ॥ येथे दोघे राहू आम्ही ॥४९॥
ऐसें उदास बोले रघुनाथ ॥ सर्वांसी आले अश्रुपात ॥
सुग्रीव सद्रद बोलत ॥ म्हणे विपरीत केवी घडे ॥२५०॥
सांडोनियां दिनपती ॥ किरणें कोणीकडे जाती ॥
कनकावेगळी कांती ॥ कल्पांतीहि नव्हेची ॥५१॥
घटास मृत्तिका सांडूनी ॥ कोणीकडे राहील भिन्न ॥
पटास तंतु त्यागोन ॥ वेगळा नोहेच सर्वथा ॥५२॥
लहरी सागरासी सांडूनी ॥ काय बैसतील काननीं ॥
तुज सांडून चापपाणी ॥ आम्हीं केवीं राहावें ॥५३॥
बिभीषण म्हणे अयोध्यापती ॥ जरी तमकूपी पडेल गभस्ती ॥
शेषही सांडील जगती ॥ परी सामर्थ्य तुझें उणे नोहे ॥५४॥
रसहीन बोलती मात ॥ जे न मानिती रणपंडित ॥
तों नवल वर्तलें अद्‌भुत ॥ वायु गुप्तरूपें पैं आला ॥५५॥
सीतावल्लभाचे कर्णीं ॥ गरुडमंत्र गेला सांगोनी ॥
रघुवीरें जपतांचि ते क्षणीं ॥ सुपर्ण वेगें धांविन्नला ॥५६॥
जैसी आंगीं केश अमूप ॥ तैसे रामासी जडले सर्प ॥
तो विष्णुवहनप्रताप ॥ देखतां सर्प पळाले ॥५७॥
तात्काळ उठले रामसौमित्र ॥ अष्टादशपद्में वानर ॥
उठोनि करिती भुभुःकार ॥ तेणें लंकानगर दणाणिलें ॥५८॥
निरभ्र नभीं दिसे दिनकर ॥ तैसे देदीप्यमान रामसौमित्र ॥
देव करिती जयजयकार ॥ सुमनसंभार वर्षती ॥५९॥
सुग्रीवादि कपि बोलती ॥ आजि लंका घालूं पालथी ॥
कोदंड चढवूनि सीतापती ॥ अरिपंथ लक्षीतसे ॥२६०॥
युद्धकांड रसभरित ॥ जेथें वीररसचि अद्‌भुत ॥
ते कथा ऐकतां समस्त ॥ शत्रुक्षय होय पैं ॥६१॥
ब्रह्मानंदा श्रीरघुवीरा ॥ दशमुखांतका समरधीरा ॥
भक्तपाळका श्रीधरवरा ॥ निर्विकारा अभंगा ॥६२॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकीनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ पंचविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२६३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय सव्विसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जय जय सुभद्रकारक भवानी ॥ मूळपीठ अयोध्यावासिनी ॥
आदिमायेची कुळस्वामिनी ॥ प्रणवरूपिणी रघुनाथे ॥१॥
नारद व्यास वाल्मीक ॥ विरिंची अमरेंद्र सनकादिक ॥
वेदशास्त्रें सुहस्रमुख ॥ कीर्ति गाती अंबे तुझी ॥२॥
सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ बिभीषण अंगद हनुमंत ॥
तेही दिवटे नाचती समस्त ॥ प्रतापदीपिका घेऊनियां ॥३॥
अठरा पद्में वानरगण ॥ त्या भूतावळिया संगे घेऊन ॥
सुवेळाचळीं येऊन ॥ गोंधळ मांडिला स्वानंदें ॥४॥
रणमंडळ हें होमकुंड ॥ द्वेषाग्नि प्रज्वळतां प्रचंड ॥
राक्षस बस्त उदंड ॥ आहुतीमाजी पडताती ॥५॥
देवांतक नरांतक महोदर ॥ प्रहस्त अतिकाय घटश्रोत्र ॥
इंद्रजित आणि दशवक्र ॥ आहुति समग्र देती ह्या ॥६॥
निजदास दिवटा बिभीषण ॥ अक्षयी लंकेसी स्थापून ॥
निजभक्ति जानकी घेऊन ॥ मूळपीठ अयोध्येसी जासील ॥७॥
हनुमंता दिवटा तुझा बळी ॥ बळें पुच्छपोत पाजळी ॥
क्षणांत लंका जाळिली ॥ केली होळी बहुसाल ॥८॥
ऐसे तुझे दिवटे अपार ॥ त्यांमाजी दासानुदास श्रीधर ॥
तेणें राजविजयदीपिका परिकर ॥ पाजळिली यथामति ॥९॥
बाळ भोळे भक्त अज्ञान ॥ प्रपंचरजनींत पडिले जाण ॥
त्यांस हे ग्रंथदीपिका पाजळून ॥ मार्ग सुगम दाविला ॥१०॥
असो पूर्वाध्यायीं रामलक्ष्मण ॥ इंद्रजितें नागपाश घालून ॥
आकळिले मग वायुदेवें येऊन ॥ सावध केले सवेंच ॥११॥
यावरी तो रणरंगधीर ॥ प्रतापार्क श्रीरघुवीर ॥
धनुष्य सजोनि सत्वर ॥ वाट पाहे शत्रूची ॥१२॥
तों कोट्यनुकोटी वानरगण ॥ सिंहनादें गर्जती पूर्ण ॥
तेणें लंकेचे पिशिताशन ॥ गजबजिले भयेंचि ॥१३॥
निर्मळ देखोनि श्रीरामचंद्र ॥ उचंबळला वानरसमुद्र ॥
भरतें लोटलें अपार ॥ लंकादुर्गपर्यंत पैं ॥१४॥
उचलोनि पाषाण पर्वत ॥ कपि भिरकाविती लंकेत ॥
राक्षसांची मंदिरें मोडित ॥ प्रळय बहुत वर्तला ॥१५॥
रावणासी सांगती समाचार ॥ दुर्गासी झगटले वानर ॥
रणीं उभे रामसौमित्र ॥ शशिमित्र जयापरी ॥१६॥
प्रहस्तासी म्हणे लंकानाथ ॥ पुत्रें शत्रुवन जाळिलें समस्त ॥
पुनरपि अंकुर तेथ ॥ पूर्ववत फुटले पैं ॥१७॥
बीज भाजून दग्ध केले ॥ तें पुनरपि अंकुरलें ॥
मृत्यूनें गिळून उगळिलें ॥ अघटित घडलें प्रहस्ता ॥१८॥
मग तो प्रधान प्रहस्त ॥ तोचि सेनापति प्रतापवंत ॥
रावणासी आज्ञा मागत ॥ शत्रु समस्त आटीन वाणी ॥१९॥
कायसे ते नर वानर ॥ माझे केवीं साहाती शर ॥
ऐसें ऐकतां विंशतिनेत्र ॥ परम संतोष पावला ॥२०॥
उत्तम वस्त्रें भूषणें ॥ प्रहस्तासीं दिधली रावणें ॥
तयासी गौरवून म्हणे ॥ विजयी होईं रणांगणीं ॥२१॥
स्वामी गौरवी स्वमुखेंकरून ॥ धन्य धन्य तोचि दिन ॥
असो वीस अक्षौहिणी दळ घेऊन ॥ प्रहस्त प्रधान निघाला ॥२२॥
चतुरंग सेनासमुद्र ॥ उत्तर द्वारें लोटला समग्र ॥
तंव अद्‌भुत सुटला समीर ॥ धुळीनें नेत्र दाटले ॥२३॥
प्रहस्तरथींचा ध्वज उन्मळला ॥ शोणितचर्चित भुज खंडला ॥
प्रहस्तापुढें आणूनि टाकिला ॥ निराळपंथे पक्ष्यांनीं ॥२४॥
मनांत दचकला प्रहस्त ॥ परी वीरश्रीनें वेष्टीत ॥
अपशकुनांची खंत ॥ टाकूनियां चालिला ॥२५॥
दृष्टीं देखोनि राक्षसभार ॥ सिंहनादें गर्जती वानर ॥
तेणें स्वर्गींचे हुडे समग्र ॥ येऊं पाहती धरणीये ॥२६॥
दोनी दळें एकवटलीं ॥ संग्रामाची झड लागली ॥
शस्त्रास्त्रें तये काळीं ॥ यामिनीचर वर्षती ॥२७॥
क्षणप्रभा नाभोमंडळीं ॥ तेवीं असिलता झळकती ते काळीं ॥
गदापाशशक्तिशूळीं ॥ खोंचती बळें कपीतें ॥२८॥
साहून वानरांचा मार ॥ कपिसेनेवरी अपार ॥
पिशिताशन अनिवार येऊनियां कोसळती ॥२९॥
तंव ते प्रतापमित्र हरिगण ॥ पर्वत आणि वृक्ष पाषाण ॥
बळें देती भिरकावून ॥ होती चूर्ण रजनीचर ॥३०॥
जैसा अग्नि लागे पर्वतीं ॥ त्यावरी पतंग असंख्य झेंपावती ॥
तैसें राक्षस मिसळती वानरचमूंत येउनी ॥३१॥
वानर चतुर रणपंडित ॥ निशाचर आटिले बहुत ॥
मग तो सेनापति प्रहस्त ॥ रथ लोटी वायुवेगें ॥३२॥
जैसी पर्वतीं वीज पडत ॥ तैसा कपींत आला अकस्मात ॥
बाण सोडिले अद्‌भुत ॥ नाहीं गणित तयांसी ॥३३॥
तंव तो बिभीषण लंकापती ॥ बोलता झाला रामाप्रति ॥
म्हणें प्रहस्त सेनापती ॥ मुख्य पट्टप्रधान रावणाचा ॥३४॥
तरी यासी सेनापति नीळ ॥ प्रतियोद्धा धाडावा सबळ ॥
तों इकडे प्रहस्तें वानरदळ ॥ बहुत आटिले ते काळीं ॥३५॥
अनिवार प्रहस्ताचा मार ॥ साहों न शकती वानर ॥
महायोद्धे समरधीर ॥ माघारले ते काळीं ॥३६॥
दृष्टीं देखोनि रघुनाथ ॥ प्रहस्तें बळें लोटिला रथ ॥
ऐसें देखोनि जनकजामात ॥ घालीत हस्त चापासी ॥३७॥
क्षण न लागतां चढविला गुण ॥ तों रामापुढें नीळ येऊन ॥
विनवीतसे कर जोडून ॥ वानरगण ऐकती ॥३८॥
म्हणे जगद्वंद्या जगदुःखहरणा ॥ जनकजापते जगन्मोहना ॥
मायाचक्रचाळका निरंजना ॥ मज आज्ञा दईंजे ॥३९॥
न लागतां एक क्षण ॥ प्रहस्ताचा घेईन प्राण ॥
अवश्य म्हणे सीतारमण ॥ विजयी होऊन येईं पां ॥४०॥
घेऊनियां महापर्वत ॥ नीळ धांवे अकस्मात ॥
जैसा पाखंडियासी पंडित ॥ सरसावला बोलावया ॥४१॥
प्रहस्तासी म्हणे नीळवीर ॥ तुम्ही म्हणवितां झुंझार ॥
शस्त्रें जवळी रक्षितां अपार ॥ मिथ्यावेष कासया ॥४२॥
बाह्यवृत्ति व्याघ्राची असे ॥ अंतरीं जंबुका भीतसे ॥
जेवी नट विरक्ताचें सोंग घेतसे ॥ परी अंतरीं त्याग नोहे ॥४३॥
वरी वैराग्य मिथ्या दावित ॥ परी मनीं तृष्णा वाढवित ॥
जैसें वृंदावन भासत ॥ रेखांकित उत्तम वरी ॥४४॥
तैसा तूं सेनापति प्रहस्त ॥ मृत्युनें तुज आणिलें येथ ॥
तुझे पितृगण समस्त ॥ काय करिती यमपुरीं ॥४५॥
त्यांचा समाचार घ्यावयासी ॥ तुज पाठवितों यमपुरीसी ॥
आतां परतोन लंकेसी ॥ कैसा जासील पाहें पां ॥४६॥
शतमूर्ख दशमुख तत्वतां ॥ पद्मजातजनकाची कांता ॥
ती आणूनियां वृथा ॥ कुलक्षय केला रे ॥४७॥
प्रहस्त म्हणे मर्कटा नीळा ॥ तुज मुत्युकाळीं फांटा फुटला ॥
ऐसे बोलून लाविला ॥ बाण चापासी प्रहस्तें ॥४८॥
नीळें हस्तींचा पर्वत ॥ प्रहस्तावरी टाकिला अकस्मात ॥
तेणें बाण सोडिले अद्‌भुत ॥ अचळ फोडिला क्षणार्धें ॥४९॥
सवेंच दुसरा शैल सबळ ॥ प्रहस्तावरी टाकी नीळ ॥
तेणें फोडूनि तत्काळ ॥ पिष्टवत् पै केला ॥५०॥
एकामागें एक अद्‌भुत ॥ नीळें टाकीले शत पर्वत ॥
तितुकेही छेदी प्रहस्त ॥ सीतानाथ पाहतसे ॥५१॥
प्रहस्ताचें बळ सबळ ॥ सर्वांगी खिळिला वीर नीळ ॥
परी तो वैश्वानराचा बाळ ॥ भिडतां मागें सरेना ॥५२॥
याउपरी नीळ दक्ष ॥ शतयोजनें ताडवृक्ष ॥
मोडूनि धांवे जेवीं विरूपाक्ष ॥ कल्पांतकाळीं क्षोभला ॥५३॥
भुजाबळें भोंवंडून ॥ वृक्ष घातला उचलोन ॥
रथासहित प्रहस्त चूर्ण ॥ रणमंडळीं जाहला ॥५४॥
जाहला एकचि जयजयकार ॥ सुमनवृष्टि करिती सुरवर ॥
रावणापासीं सत्वर ॥ घायाळ जाऊन सांगती ॥५५॥
पडिला ऐकतां प्रहस्त ॥ शोक करी लंकानाथ ॥
म्हणे व्याघ्र प्रतापवंत ॥ गोवत्सांनी मारियेला ॥५६॥
कमळगर्भींचा घेऊन तंत ॥ मशकें बांधिला ऐरावत ॥
खद्योततेजें आदित्य ॥ आहाळला कैसा आजि तो ॥५७॥
सैन्यकासी म्हणे लंकानाथ ॥ सेना सिद्ध करावी त्वरित ॥
आजि मी युद्ध करीन अद्‌भुत ॥ जिंकीन रघुनाथा कपींसीं ॥५८॥
घाव निशाणीं दिधले सत्वर ॥ दणाणिलें लंकानगर ॥
कोट्यानकोटी महावीर ॥ सिद्ध जाहले शस्त्रास्त्रीं ॥५९॥
तो लंकापतीची पट्टराणी ॥ मंदोदरी विवेकखाणी ॥
तियेचे दूत सभास्थानीं ॥ परम धूर्त बैसले होते ॥६०॥
समय देखोनि विपरीत ॥ स्वामिणीपाशीं गेले त्वरित ॥
वर्षाकाळीं धांवत ॥ सरितापूर जैसे कां ॥६१॥
कीं शरासनापासोन ॥ सायक धांवती त्वरेंकरून ॥
कीं अस्ता जातां उष्णकिरण ॥ पक्षी आश्रमा धांवती ॥६२॥
तैसे स्वामिणीपासीं येऊन ॥ पाणी जोडून करिती नमन ॥
मग अधोदृष्टीनें वर्तमान ॥ सांगती सकळ सभेचे ॥६३॥
रणीं पडला प्रहस्तप्रधान ॥ म्हणोनियां दशानन ॥
सकळ सेना सिद्ध करून ॥ आतांचि जातो संग्रामा ॥६४॥
ऐसा समाचार ऐकोनि ॥ मंदोदरी लावण्यखाणी ॥
जिच्या स्वरूपावरूनि ॥ रतिवर ओवाळिजे ॥६५॥
जिची मुखशोभा देखोनि ॥ विधुबिंब गेले विरूनि ॥
चंपककळिका गौरवर्णी ॥ सुकुमार त्याहूनि बहुत ॥६६॥
आंगींची प्रभा अत्यंत ॥ तेणें अलंकार शोभत ॥
कीं त्रिभुवन हिंडोनि रतिकांत ॥ श्रमोन तेथें विसांवला ॥६७॥
हास्य करितां कौतुकें ॥ दंततेज मंदिरीं झळके ॥
बोलतां रत्‍नें अनेकें ॥ भूमीवरी विखुरती ॥६८॥
आंगींचे सुचासें करून ॥ कोंदलें असे अवघे सदन ॥
तडिदंबर वेष्टिलें पूर्ण ॥ सुवास मृदु निर्मळ ॥६९॥
चपळेचा प्रकाश पडे ॥ तैसे झळकती हातींचे चुडे ॥
वीस नेत्र होऊनि वेडे ॥ रावणाचे पाहती ॥७०॥
ते लावण्यसागरीची लहरी ॥ दूतवार्ता ऐकोनि मंदोदरी ॥
सुखासनीं बैसोन झडकरी ॥ सभेसी तेव्हां चालिली ॥७१॥
भोंवते दासींच चक्र ॥ जाणविती नानाउपचार ॥
सवें माल्यवंत प्रधान चतुर ॥ बहुत वृद्ध जाणता ॥७२॥
आणि अतिकाय कुमर ॥ जैसा पार्वतीसी स्कंद सुंदर ॥
कीं शचीजवळी जयंत पुत्र ॥ अतिकाय शोभे तैसा ॥७३॥
सहस्रांचे सहस्र दूत ॥ कनकवेत्रपाणि पुढें धांवत ॥
जन वारूनि समस्त ॥ वाट करिती चालावया ॥७४॥
अंगीच्या प्रभा फांकती ॥ तेणें गोपुरचर्या उजळती ॥
असो ते मंदोदरी सती ॥ सभाद्वारा प्रवेशे ॥७५॥
अधोवदनें तेव्हां जन ॥ सकळ परते गेले उठोन ॥
तेव्हां मंदोदरीनें येऊन ॥ पतीचीं पदें नमियेलीं ॥७६॥
दशमुख बोले हांसोन ॥ आपलें कां झालें आगमन ॥
मग क्षणएक निवांत बैसोन ॥ मयजा वचन बोलत ॥७७॥
टाकोनियां शुद्ध पंथ ॥ आडमार्गे जो गमन करित ॥
तया अपाय येती बहुत ॥ यास संदेह नाहींचि ॥७८॥
सर्वांसी विरोध करून ॥ आपुलें व्हावे म्हणे कल्याण ॥
तो अनर्थीं पडेल पूर्ण ॥ यासी संदेह नाहींचि ॥७९॥
वेदशास्त्रीं जे अनुचित ॥ तेथें बळें घाली चित्त ॥
तेणें आपुला केला घात ॥ यासी संदेह नाहींचि ॥८०॥
विवेकसद्बुद्धीचे बळें ॥ अनर्थ तितुके टाळावे कुशळें ॥
वचनें संतांची निर्मळे ॥ हृदयीं सदा धरावी ॥८१॥
राया पुरुषार्थ हाचि पूर्ण ॥ परदारा आणि परधन ॥
येथें जो न घाली मन ॥ तोचि धन्य शास्त्र म्हणे ॥८२॥
नंदनवनींचा मिलिंद ॥ दिव्यसुमनांचा घेत सुगंध ॥
त्यासी पलांडुपुष्पी लागला वेध ॥ नवल थोर वाटे हें ॥८३॥
सुरतरूच्या सुमनांवरी ॥ जो निद्रा करी अमरमंदिरी ॥
तो निजो इच्छी खदिरांगारीं ॥ नवल परम वाटे हें ॥८४॥
ज्याची ललना सुंदर बहुत ॥ जीतें अष्टनायिका लाजत ॥
तो पुरुष अन्य आलिंगू इच्छित ॥ नवल परम वाटे हें ॥८५॥
सुरभि सुरतरु चिंतामणि ॥ इच्छिले तें पुरवी सदनीं ॥
तो कोरान्न इच्छित मनीं ॥ नवल परम वाटे हें ॥८६॥
अंतरीं जाणूनि यथार्थ ॥ अन्यथा बळें प्रतिपादित ॥
न करावें तें बळेंचि करित ॥ तरी अनर्थ जवळी आला ॥८७॥
मी जाणता सर्वज्ञ ॥ ऐसा पोटीं वाहे अभिमान ॥
शतमूर्खाहूनि न्यून ॥ कर्म आचरे बळेंचि ॥८८॥
याचलागीं लंकेश्वरा ॥ कामासी कदा नेदीं थारा ॥
कामसंगें थोरथोरां ॥ अनर्थी पूर्वीं पाडिलें ॥८९॥
तुमचा स्वामी त्रिनेत्र ॥ त्याचा शत्रु काम अपवित्र ॥
तो तुम्ही केला मित्र ॥ तरी उमावर क्षोभला ॥९०॥
स्मरारिमित्र रामचंद्र ॥ त्यासी सख्य करा साचार ॥
मग तो संतोषोनि कर्पूरगौर ॥ अक्षयीं पद देईल ॥९१॥
सीता परम पतिव्रता ॥ हे रामापासींच बरी गुणभरिता ॥
कलहकल्लोळसरिता ॥ आणिकाचे गृहीं हे ॥९२॥
हे काळानळाची तीव्र ज्वाळा ॥ क्षणें जाळील ब्रह्मांडमाळा ॥
लंकेसी आणितां क्षय कुळा ॥ करील आमुच्या निर्धारें ॥९३॥
सहस्रार्जुनें नेऊन बळें ॥ राया तुम्हा बंदीं रक्षिले ॥
त्यास भुगुपतीनें मारिले ॥ त्यासही जिंकिलें राघवें ॥९४॥
ऐसा बळिया रघुनंदन ॥ जेणें जळीं तारिले पाषाण ॥
तरी त्यासीं सख्य करून ॥ आपणाधीन करावा ॥९५॥
हिरण्यकश्यपा नाटोपे हरी ॥ प्रह्लाद जन्मला त्याचे उदरीं ॥
तेणें सख्य करून मुरारि ॥ आपणाधीन पैं केला ॥९६॥
चिरंजीव करूनि कुळवल्ली ॥ जगीं कीर्ति वाढविली ॥
तैसा रामसखा ये काळीं ॥ करून वाढवा सत्कीर्ति ॥९७॥
तुम्हांस धरिलें ज्या वाळीनें ॥ तो जेणें निवटिला एकबाणें ॥
त्यासी आतां सख्य करणें ॥ मनीं धरूनि हे गोष्टी ॥९८॥
भक्ति वेगळा रघुनाथ ॥ तुम्हांस वश नव्हे यथार्थ ॥
सीता देऊन सीताकांत ॥ आपणाधीन करावा ॥९९॥
ज्याहीं पुरुषार्थ करूनि ॥ सुरांचे मुकुट पाडिले धरणी ॥
ते राक्षस पाडिले रणीं ॥ कोट्यनकोटी पाहें पां ॥१००॥
महाबळी भक्तराज परम ॥ तेणें वश केला पुरुषोत्तम ॥
तैसाच तुम्हीं श्रीराम ॥ आपणाधीन करावा ॥१॥
यावरी म्हणे दशकंधर ॥ प्रिये बोलसी सारांशोत्तर ॥
परी मी पुरुषार्थी असुरेश्वर ॥ राम मित्र कदा न करी ॥२॥
आतां जाऊन समरांगणीं ॥ नर वानर आटीन रणीं ॥
तेव्हां तूं ऐकशील कर्णीं ॥ पुरुषार्थ माझा कैसा तो ॥३॥
कैलास हालविला बळें ॥ बंदीस सकळ देव घातले ॥
आतां पाहे शिरकमळें ॥ शत्रूंची आजि आणीन ॥४॥
मयजा म्हणे जी उदारा ॥ बळेंच अनर्थ आणितां घरा ॥
हिरा सांडोनियां गारा ॥ संग्रहीतां कासया ॥५॥
कल्पवृक्ष उपडून ॥ कां वाढवितां कंटकवन ॥
राजहंस दवडून ॥ दिवाभीतें कां पाळावीं ॥६॥
सुधारस सांडोनि देख ॥ कांजी पितां काय सार्थक ॥
सुरभि दवडूनि सुरेख ॥ अजा कासया पाळावी ॥७॥
वृंदावन दिसे सुंदर वहिले ॥ परी काळकू ट आंत भरलें ॥
तरी ते न सेविजे कदाकाळे ॥ विवेकीयानें सहसाही ॥८॥
फणस फळासमान ॥ कनकफळ दिसे पूर्ण ॥
परी ते भुलीस कारण ॥ विवेकीयानें ओळखावें ॥९॥
सर्पमस्तकींचा मणि ॥ घेऊं जातां प्राणहानि ॥
तैसी श्रीरामाची राणी ॥ समूळ कुळ निर्दाळील ॥११०॥
मग बोले लंकापति ॥ तमकूपीं पडेल गभस्ति ॥
मृगजळीं बुडेल अगस्ति ॥ कल्पांतीही घडेना ॥११॥
क्रोधें खवळला मृगनायक ॥ त्यासी केवी मारील जांबुक ॥
वडवानळासी मशक ॥ विझवी घृत घेऊनियां ॥१२॥
तरी आतां वल्लभे आपण ॥ गृहाप्रति जावें उठोन ॥
स्वस्थ असों द्यावें मन ॥ चिंता काही न करावी ॥१३॥
मंदोदरीची सारवचनें ॥ जी विवेकनभीची भगणें ॥
सुबुद्धिसागरींची रत्‍नें ॥ परी रावणें ती उपेक्षिली ॥१४॥
कमळसुवास परम सुंदर ॥ परी तो काय जाणे दर्दुर ॥
मुक्तफळांचा आहार ॥ बक काय घेऊं जाणे ॥१५॥
कस्तुरीचा अत्यंत सुवास ॥ परी काय सेवूं जाणे वायस ॥
तत्त्वविचार मद्यपियास ॥ काय व्यर्थ सांगून ॥१६॥
जन्मांधापुढें नेऊन ॥ व्यर्थ काय रत्‍नें ठेवून ॥
कीं उत्तम सुस्वर गायन ॥ बधिरापुढे व्यर्थ जैसे ॥१७॥
पतिव्रतेचे धर्म सकळ ॥ जारिणीस काय सांगोनि फळ ॥
धर्मशास्त्रश्रवण रसाळ ॥ वाटपाड्यासी कायसें ॥१८॥
तैसीं मयजेचीं उत्तरें ॥ उपेक्षिलीं पौलस्तिपुत्रें ॥
मग ते पतिव्रता त्वरें ॥ निजगृहासी चालिली ॥१९॥
चित्तीं झोंबला चिंताग्न ॥ गोड न वाटे भोजन शयन ॥
भूषणें भोगविलास संपूर्ण ॥ वोसंडून टाकीत ॥१२०॥
असो संग्रामसंकेतभेरी ॥ परम धडकल्या ते अवसरीं ॥
दशकंठ सहपरिवारीं ॥ युद्धालागीं निघाला ॥२१॥
सर्व प्रधान आणि कुमर ॥ अवघा लंकेतील दळभार ॥
निघता जाहला अपार ॥ सेनासमुद्र ते काळीं ॥२२॥
लंकेची महाद्वारें ॥ ती उघडिलीं एकसरें ॥
दळ चालिलें थोर गजरें ॥ जेवी प्रळयीं समुद्र फुटे ॥२३॥
पायदळ निघालें अपार ॥ पर्वतासमान प्रचंड वीर ॥
कांसा घातल्या विचित्र ॥ अभेदकवचे अंगी बीद्रें ॥२४॥
आपादमस्तकपर्यंत ॥ खेकटे विशाळ झळकत ॥
असिलता शक्ति कुंत बहुत ॥ शूल तोमर आयुधें ॥२५॥
लोहार्गळा खड्गें मुद्रल ॥ कोयते कांबिटें गदा विशाळ ॥
फरश यमदंष्ट्रा भिंडिमाळ ॥ घेऊनि चपळ धांवती ॥२६॥
तयांपाठीं विचित्र ॥ लोटले तुरुंगाचे भार ॥
कीं तें अश्वरत्‍नांचें भांडार ॥ एकसरें उघडिले ॥२७॥
असंख्य अश्व श्यामसुंदर ॥ पुच्छ पिवळे आरक्त खुर ॥
डोळे ताम्रवर्ण सुंदर ॥ तिहीं लोकीं गति जयां ॥२८॥
सूर्यरथीं चिंतामणी ॥ त्याचि वेगें क्रमिती अवनी ॥
एक नीळ पिंवळे हिंसती गगनीं ॥ प्रतिशब्द उठताती ॥२९॥
एक पारवे परम चपळ ॥ एक मणिकाऐसे तेजाळ ॥
सांवळे निळे चपळ ॥ चांदणें पडे अंगतेजें ॥१३०॥
एक सिंहमुख सुंदर ॥ चकोरें चंद्रवर्ण सुकुमार ॥
क्षीर केशर कुंकुम शेंदूर ॥ वर्णांचे एक धांवती ॥३१॥
जांबूळवर्ण परम चपळ ॥ हे जंबुद्वीपींच निपजती सकळ ॥
क्रौंचद्वीपींचे श्वेत वेगाळ ॥ शशिवर्ण हंसत ते ॥३२॥
शाल्मलिद्विपींच सुकुमार ॥ शाकलद्वीपींचे चित्रविचित्र ॥
नागद्वीपीचें परिकर ॥ कुशद्वीपींचे सबळ पैं ॥३३॥
पुष्करींचे श्यामकर्ण ॥ ते उदकावरी जाती जैसे पवन ॥
जबडा रुंद आंखूड मान ॥ ते बदकश्याम निघाले ॥३४॥
रणांगणीं परम धीर ॥ ते आरबी वारू सुंदर ॥
कपिचंचळ सुकुमार ॥ समरी धीर धरिती जे ॥३५॥
खगेश्वरासमान गती ॥ पक्ष्यांऐसे अंतरिक्षी उडती ॥
खुणावितां प्रवेशती ॥ परदळीं पवनासारिखे ॥३६॥
जैसी कां अलातचक्रे ॥ तैसे राऊत फिरती त्वरें ॥
असिलता झळकती एकसरें ॥ चपळऐशा तळपती ॥३७॥
अश्व खङ्ग क्षेत्री पूर्ण ॥ तिहींचे होय एक मन ॥
रावणाचें तैसेंचि सैन्य पूर्ण ॥ असंख्य वारु चालिले ॥३८॥
अश्वपंजरीं पाखरिलें बहुत ॥ अलंकार घातले रत्‍नखचित ॥
विशाळमुक्तघोंस झळकत ॥ जाती नाचत रणभूमी ॥३९॥
नेपुरें गर्जती चरणीं ॥ पुढील खुर न लागत अवनीं ॥
रत्‍नखचित मोहाळी वदनीं ॥ झळकती चपळेसमान ॥१४०॥
वज्रकवचेंसी बळिवंत ॥ वरी आरूढले चपळ राऊत ॥
त्यांचे पाठीसीं उन्मत्त ॥ गजभार खिंकाटती ॥४१॥
जैसे ऐरावतीचे सुत ॥ चपळ श्वेत आणि चौदंत ॥
झुली घातल्या रत्‍नजडित ॥ पृष्ठ उदरीं आंवळिले ॥४२॥
रत्‍नजडित चंवरडोल ॥ ध्वज भेदिती निराळ ॥
घंटा वाजती सबळ ॥ चामरें थोर रूळती पैं ॥४३॥
वरी गजआकर्षक बैसले ॥ सुवर्णचंचुवत अंकुश करी घेतले ॥
संकेत दावितां चपबळें ॥ परमचमूंत मिसळती ॥४४॥
त्यांचे पाठी दिव्य रथ ॥ चपळे ऐसीं चक्रें झळकत ॥
वरी ध्वज गगनचुंबित ॥ नानावर्णीं तळपती ॥४५॥
धनुष्यें शक्ती नानाशस्त्रें ॥ रथावरी रचिलीं अपारें ॥
कुशळ सूत बैसले धुरे ॥ वाग्दोरें हाती धरूनियां ॥४६॥
असो सुवेळपंथे अपार ॥ चालिले चतुरंग दळभार ॥
तेथें रणवाद्ये परम घोर ॥ एकदांचि खोंकाती ॥४७॥
शशिवदना भेदी धडकती ॥ वाटे नादे उलेल जगती ॥
शंख वाजतां दुमदुमती ॥ दिशांची उदरे तेधवां ॥४८॥
ढोल गिडबिडी कैताळ ॥ त्यांत सनया गर्जती रसाळ ॥
शृंगें बुरंगें काहाळ ॥ दौंडकीं दुटाळ वाजती ॥४९॥
रामास दावी बिभीषण ॥ आजि सकळ सेना घेऊन ॥
युद्धासी आला जी रावण ॥ पुत्रपौत्रांसहित पैं ॥१५०॥
एक लक्ष पुत्रसंतती ॥ सवालक्ष पौत्रगणती ॥
धन्य रावणाची संपत्ति ॥ कपी पाहती आदरें ॥५१॥
सकळ पुत्रप्रधानांची नामें ॥ बिभीषण सांगे अनुक्रमें ॥
दृष्टी देखोन रघुत्तमें ॥ आश्चर्य केलें ते समयीं ॥५२॥
मध्यें रावणाचा रथ ॥ प्रभेस न्यून सहस्र आदित्य ॥
विरिंचिहस्तें निर्मित ॥ तो दिव्य अनुपम ॥५३॥
त्या रथाचा जोडा दुजा रथ ॥ नसे त्रिभुवनीं यथार्थ ॥
त्यावरी मंदोदरीकांत ॥ दिसे मंडित वस्त्राभरणीं ॥५४॥
वरी त्राहाटिली दाही छत्रें ॥ झळकती चामरे मित्रपत्रें ॥
ऐसें देखोनि मित्रपुत्रें ॥ द्विजें अधर रगडिले ॥५५॥
शत्रूचें वैभव अगाध ॥ देखोनि सुग्रीवा नावरे क्रोध ॥
ऐकोनि वारणाचा शब्द ॥ जैसा मृगेंद्र हुंकारे ॥५६॥
तृणपर्वत संघटतां जवळी ॥ कैसा उगा राहे ज्वाळामाळी ॥
मृगेंद्र दृष्टीं न्याहाळी ॥ मग गज केंवी स्थिरावे ॥५७॥
असो तैसा किष्किंधानाथ ॥ धांवे घेऊन पर्वत ॥
रावणावरी अकस्मात ॥ परम आवेशें टाकिला ॥५८॥
तों दशमुखे सोडोनि बाण ॥ पिष्ट केला पर्वत जाण ॥
सवेंच सोडिले दशबाण ॥ सुग्रीव हृदयी खिळियेला ॥५९॥
क्रोधावला सूर्यसुत ॥ सवेंचि उपडोनि विशाळ पर्वत ॥
रावणावरी अकस्मात ॥ गगनपंथें टाकिला ॥१६०॥
तोही रावणें फोडिला ॥ मग शतबाणीं सुग्रीव खिळिला ॥
रक्तधारा तये वेळा ॥ भडभडा सूटल्या ॥६१॥
मूर्च्छा येऊन तये क्षणीं ॥ सुग्रीव स्वीकारूं पाहे धरणी ॥
मग वानर अठरा आक्षौहिणी ॥ एकदांचि उठावले ॥६२॥
शिळा वृक्ष पाषाण ॥ कपींनीं यांचा पाडिला पर्जन्य ॥
परी तितुक्यांसी रावण ॥ एकलाच पुरवला ॥६३॥
जैसा पाखांडी कुतर्क घेतां ॥ नावरेच बहु पंडितां ॥
तेवीं सकळ कपीं भिडतां ॥ लंकानाथ न गणीच ॥६४॥
असंख्यात सोडूनि शर ॥ घायीं जर्जर केले वानर ॥
तों थोर थोर कपीश्वर ॥ उभे होते रामापाशीं ॥६५॥
त्यांमाजी सातजण ॥ धांवती जैसे पंचानन ॥
शरभ गवय गंधमादन ॥ मैंद कुमुद द्विविद ॥६६॥
गवाक्ष सातवा वीर ॥ पर्वत घेऊनि सत्वर ॥
हाकें गर्जवीत अंबर ॥ रावणावरी टाकिले ॥६७॥
रावणें पर्वत फोडोनि समस्त ॥ शरीं खिळिलें वानर सप्त ॥
भूमीसीं पडले आक्रंदत ॥ परम अनर्थ वोढवला ॥६८॥
अनिवार दशमुखाचा मार ॥ देखोनि पळती कपिभार ॥
ते पाहून राम रणरंगधीर ॥ चाप सत्वर चढवतीसे ॥६९॥
तंव विनवी ऊर्मिलापति ॥ माझे बाहु बहु स्फुरती ॥
आज्ञा द्यावी मजप्रति ॥ शिक्षा लावीन दशमुखा ॥१७०॥
अवश्य म्हणे रघुनंदन ॥ सौमित्रें सजोनियां बाण ॥
जैसा उठे पंचानन ॥ रावणासन्मुख लोटला ॥७१॥
म्हणे रे तस्करा दशमुखा ॥ बुद्धिहीना शतमूर्खा ॥
आणूनियां जनककन्यका ॥ कुळक्षय केला रे ॥७२॥
कृतांताचे दाढेसी ॥ सांपडलासी निश्चयेसी ॥
आतां कोणीकडे पळसी ॥ जीव घेऊन माघारा ॥७३॥
ऐसें बोले लक्ष्मण ॥ तों विशाळ पर्वत घेऊन ॥
धांवे निराळोद्‌भवनंदन ॥ द्विदशनेत्रावरी तेधवां ॥७४॥
जैसी कडकडोनि पडे चपळा ॥ तैसा पर्वत रावणावरी टाकिला ॥
रावणें फोडोनि ते वेळां ॥ पिष्ट केला अंतरिक्षीं ॥७५॥
रथावरी चढला हनुमंत ॥ रावणें झाडिली सबळ लाथ ॥
मूर्च्छना सांवरून वायुसुत ॥ उसनें घेता जाहला ॥७६॥
रावणहृदयीं ते काळीं ॥ कपीने वज्रमुष्टी दिधली ॥
रावणासी गिरकी आली ॥ मूर्च्छा सांवरी सवेंचि ॥७७॥
मग सबळ मुष्टिघात ॥ मारुतीसी मारी लंकानाथ ॥
तों विशाळ घेऊन पर्वत ॥ नळ वानर धांविन्नला ॥७८॥
पर्वत टाकिला रावणावरी ॥ तेणें पिष्ट केला अंबरीं ॥
नळ खिळिला पंचशरीं ॥ हृदयावरी तेधवां ॥७९॥
तों नळें केलें अद्‌भुत ॥ मंत्र जपे ब्रह्मादत्त ॥
कोट्यनकोटी नळ तेथें ॥ प्रगट झाले तेधवां ॥१८०॥
घेऊन पाषाण पर्वत ॥ रावणावरी टाकिती समस्त ॥
दोनी दळें झालीं विस्मित ॥ सीतानाथ नवल करी ॥८१॥
ऐसे जाहलें एक मुहूर्त ॥ मग ब्रह्मास्त्र प्रेरी लंकानाथ ॥
नळ मावळले समस्त ॥ जेवीं नक्षत्रें सूर्योदयीं ॥८२॥
कीं पारदाची रवा फुटली ॥ एकत्र येऊनि कोठी जाहली ॥
मुख्य नळ ते वेळीं ॥ रणांगणीं उरलासे ॥८३॥
असो सिंहनादें गर्जोन ॥ पुढें धांवे लक्ष्मण ॥
तयाप्रति रावण ॥ बोलता जाहला अतिगर्वें ॥८४॥
म्हणे तूं मनुष्याचा कुमर ॥ अजून माथांचा ओला जार ॥
तुवां संग्राम तरी निर्धार ॥ कोठें केला सांग पां ॥८५॥
सौमित्र म्हणे रे मशका ॥ माझा संग्राम पाहें कीटका ॥
तुझें आयुष्य सरलें मूर्खा ॥ लंका दिधली बिभीषणासी ॥८६॥
सिंहदरीतें आला कुंजर ॥ तो केवीं जिवंत जाईल बाहेर ॥
सुपर्णे धरिला फणिवर ॥ तो केवीं प्रवेशे वारुळी ॥८७॥
भुजंगें धरिला मूषक दांतीं ॥ तो कैसा सुटेल पुढतीं ॥
समुद्रतीरीं अगस्ति ॥ उगाचि कैसा बैसेल ॥८८॥
तृतीयनेत्रींचा प्रळयाग्न ॥ चालिला रतिपतीस लक्षून ॥
मग राहील विझोन ॥ हे काळत्रयीं घडेना ॥८९॥
तैसा श्रीराम लावण्यराशी ॥ चालोन आला लंकेसी ॥
तूं पुत्रपौत्रें नांदसी ॥ हे काळत्रयीं घडेना ॥१९०॥
ऐसें बोलोन लक्ष्मण ॥ सोडी बाणापाठीं बाण ॥
शब्दामागें शब्द पूर्ण ॥ वदनींहून जेवी निघती पैं ॥९१॥
चपळ लेखकापासाव एकसरें ॥ निघती अक्षरांपासाव अक्षरें ॥
तैसे बाण सुमित्राकुमरें ॥ रावणापरी सोडिले ॥९२॥
रावणाचें अंगी ते वेळें ॥ बळें सपक्ष बाण रुतले ॥
पांच बाण रावणें सोडिले ॥ सौमित्रावरी तेधवां ॥९३॥
जैशा पंच विद्युल्लता ॥ तैसे सौमित्रे देखिले शर येतां ॥
मग ते वरचेवरी तत्वतां ॥ निजशरें पिष्ट केले ॥९४॥
परम क्रोधे दशमौळी ॥ ब्रह्मशक्ति बाहेर काढिली ॥
अभिमंत्रोन सोडिली ॥ राघवानुजा लक्षूनियां ॥९५॥
ते अनिवार शक्ति पूर्ण ॥ सुमित्रासुतें सोडिला बाण ॥
अर्ध टाकिली खंडोन ॥ अर्ध हृदयीं बैसली ॥९६॥
तेणें निचेष्टित सौमित्र पडिला ॥ श्वासोच्छ्वास बंद जाहला ॥
ऐसें देखोनि रावण धांविन्नला ॥ रथाखाली उतरूनियां ॥९७॥
निचेष्टित असतां सौमित्र ॥ वरी हाणी मुष्टिप्रहार ॥
जैसे निजल्यावरी तस्कर ॥ बहुत घाय घालिती ॥९८॥
तें मारुतीनें देखोन डोळां ॥ कृतांतापरी धांविन्नला ॥
लत्ताप्रहार ते वेळां ॥ सबळ दिधला रावणा ॥९९॥
पादरक्षेचे घायीं देख ॥ लोक ताडिती वृश्चिक ॥
कीं दंदशुकाचें मुख ॥ पाषाणें चूर्ण करिती पैं ॥२००॥
तैसें लत्ताप्रहारेंकरून ॥ असुरहृदय केले चूर्णं ॥
रक्त ओकीत रावण ॥ रथावर गेला आपुल्या ॥१॥
तों सावध जाहला लक्ष्मण ॥ वेगें सोडी निर्वाण बाण ॥
रावणाचें हृदय फोडून ॥ पलीकडे शर गेला ॥२॥
व्यथा सौमित्राची देखोन ॥ क्षोभे जैसा प्रळयाग्न ॥
अनुज पाठीसी घालून ॥ पुढें जाहला रघुवीर ॥३॥
रावण आरूढला रथावरी ॥ जैसा जलद नगशिखरी ॥
ऐसा देखतां रावणारि ॥ काय करिता जाहला ॥४॥
हनुमंतस्कंधावरी रघुवीर ॥ उभा ठाके रावणासमोर ॥
जैसा उदयाचळीं दिनकर ॥ किंवा श्रीधर गरुडावरी ॥५॥
ऐरावतारूढ शचीनायक ॥ कीं नंदीवरी मदनांतक ॥
तयापरी अयोध्यानायक ॥ हनुमंतस्कंधी शोभला ॥६॥
क्रोधायमान रघुनंदन ॥ प्रथम सोडी एक बाण ॥
रावणाचीं दाही छत्रें छेदून ॥ अकस्मात पाडिलीं ॥७॥
मित्रपत्रें आणि चामरें ॥ सवेंचि छेदिली दुज्या शरें ॥
मुकुट भूमीसी एकसरें ॥ चूर करून पाडिले ॥८॥
सवेंच भाते दहाही धनुष्यें ॥ छेदोनि पाडिलीं अयोध्याधीशें ॥
विचित्र केलें परमपुरुषें ॥ प्रथमारंभी ते काळीं ॥९॥
राघव बोले गर्जोनी ॥ दशमुखा तुज सोडिलें रणी ॥
आज श्रमलासी रणांगणीं ॥ जाय सत्वर माघारा ॥२१०॥
आपली संपदा भोगून ॥ सकळ स्त्रियांस येईं पुसोन ॥
पुत्र पौत्र आप्तजन ॥ निरोप घेऊन येईं त्यांचा ॥११॥
मग झुंजतां समरांगणीं ॥ तुझा देह खंडविखंड करूनि ॥
तत्काळ पाडीन धरणीं ॥ निश्चय मनीं जाण पां ॥१२॥
इतुकी जवळी असतां सेना ॥ तूं कां आलासी समरांगणा ॥
दुर्जना बुद्धिहीना मलिना ॥ मुख येथें न दाखवीं ॥१३॥
ऐसें बोलतां जानकीजीवन ॥ दशमुख जाहला दर्पभग्न ॥
अजासर्पन्यायेंकरून ॥ उगाचि तटस्थ पाहतसे ॥१४॥
जो पीडे दरिद्रेंकरून ॥ तो देश त्यागी जाय उठोन ॥
तैसा रावण रण सांडून ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥१५॥
कीं जो यातींतून भ्रष्ट जाहला ॥ तो जेवीं ब्राह्मणीं दवडिला ॥
की दिव्य देतां खोटा जाहला ॥ तो लाजोनी जाय पैं ॥१६॥
असो आता नानाप्रयत्‍न करून ॥ कुंभकर्णास उठवील रावण ॥
ती कौतुककथा गहन ॥ श्रवण करोत पंडित ॥१७॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ अंबर ॥ नानादृष्टांत भगणें सुंदर ॥
तेथें उदय पावला रामचंद्र ॥ निष्कलंक अक्षयी ॥१८॥
ब्रह्मानंद श्रीरामचंद्र ॥ जो निर्मळ शीतळ उदार ॥
तेथें अनन्य श्रीधर चकोर ॥ स्वानंदामृत सेवीतसे ॥१९॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ षड्‌विंशतितमोऽध्याय गोड हा ॥२२०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय सत्ताविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
आळसी कदा उदीम न करी ॥ नवजाय मंदिराबाहेरी ॥
तो जगन्निवास साहाकारी ॥ घरींच निर्धारी भाग्यें आला ॥१॥
मृत्तिका खणावया जात ॥ तों मांदुस सांपडे अकस्मात ॥
तैसें आम्हांसी जाहले यथार्थ ॥ सद्‌गुरुनाथप्रसादें ॥२॥
अभ्यास न करितां बहुवस ॥ सांपडली रामविजयमांदुस ॥
मग गगनीं न माय हर्ष ॥ उपरति जाहली ॥३॥
मांदुस उघडोनि जो न्याहाळी ॥ तों आंत होती सात कोळळी ॥
तीं हीं सप्तकांडें रसाळी ॥ एकाहूनि एक विशेष ॥४॥
कोहळीं न्याहाळून जंव पाहत ॥ तंव दिव्य नाणीं दीप्तियुक्त ॥
भक्ति ज्ञान वैराग्ययुक्त ॥ घवघवीत विराजती ॥५॥
चतुर श्रोते ज्ञानसंपन्न ॥ ते बंधु आले जवळी धांवोन ॥
म्हणती आम्हांस वांटा दे समान ॥ मांडलें भांडण प्रेमभरें ॥६॥
म्हणती हीं वाल्मीकाचीं कोहळी ॥ तुज पूर्वभाग्यें लाधली ॥
तरी वाटा आम्हास ये वेळी ॥ देईं सर्वांसी सारिखा ॥७॥
मग चतुर संतजन ॥ श्रवणपंक्तीं बैसले समान ॥
कोळीं त्यापुढें नेऊन ॥ एकसरे रिचविली ॥८॥
मग त्यांही कर्णद्वारें उघडोन ॥ हृदयभांडारीं सांठविलें धन ॥
श्रोते वक्ते सावधान ॥ निजसुख पूर्ण पावले ॥९॥
पांच कोहळीं दाविली फोडून ॥ सहावें युद्धकांड विशाळ गहन ॥
असो गताध्यायीं कथा निरूपण ॥ राघवें रावण निर्भर्त्सिला ॥१०॥
छत्र मुकुट टाकिले छेदून ॥ अपमान पावला रावण ॥
मग लंकेत परतोन ॥ चिंतार्णवी बुडाला ॥११॥
जैसा राहुग्रस्त निशाकर ॥ कीं काळवंड दग्ध कांतार ॥
कपाळशूळें महाव्याघ्र ॥ तैसा दशकंठ उतरला ॥१२॥
नावडे छत्र सिंहासन ॥ जें जें पाहूं जाय रावण ॥
तें तें रामरूप दिसे पूर्ण ॥ नाठवे आन पदार्थ ॥१३॥
सभेसी बैसला रावण ॥ अत्यंत दिसे कळाहीन ॥
महोदराप्रति वचन ॥ बोलता जाहला ते वेळां ॥१४॥
म्हणे कैसा विपरीत काळ ॥ मक्षिकेनें हालविला भूगोळ ॥
चित्रींच्या सर्पे खगपाळ ॥ गिळिला नवल वाटतें ॥१५॥
खद्योततेजेंकरून ॥ आहाळोनि गेला चंडकिरण ॥
तैसा मी आजि रावण ॥ युद्धीं पावलों पराजय ॥१६॥
मग बोलती प्रधान ॥ आतां उठवावा कुंभकर्ण ॥
तो रामसौमित्रांसहित सैन्य ॥ गिळील क्षण न लागतां ॥१७॥
ती रावणासी मानली मात ॥ म्हणे घटश्रोत्रासी उठवा त्वरित ॥
मग विरूपाक्ष महोदार निघत ॥ दहा सहस्र राक्षस घेऊनियां ॥१८॥
मद्यखाला चारी सहस्र ॥ कुंजरीं घातल्या सत्वर ॥
तैसेच पशू घेतले अपार ॥ अन्नाचे पर्वत घेऊनियां ॥१९॥
वाद्यें वाजविती भयासुर ॥ गजरेंसी पावले सत्वर ॥
देखोनि भयानक शरीर ॥ कंप सुटला राक्षसां ॥२०॥
वनगज म्हैसे तरस ॥ नासिकांत गुंतले बहुवस ॥
टाकितां श्वासोच्छ्वास ॥ निर्गम नव्हे तयांसी ॥२१॥
सवा लक्ष गांवे खोल ॥ सरितापतीचें तुंबळ जळ ॥
तें नाभिप्रमाण केवळ ॥ कुंभकर्णासी होय पैं ॥२२॥
असो राक्षस सर्व मिळती ॥ द्वारीं एकदांचि हांका फोडिती ॥
सकळ वापी कूप आटती ॥ महागजरेंकरूनियां ॥२३॥
स्वर्गापर्यंत ऐको जाती ॥ ऐशा कर्णीं भेरी त्राहाटिती ॥
उरावरी गज चालविती ॥ परी जागा नोहे सर्वथा ॥२४॥
एक गगनचुंबित वंश घेऊन ॥ नासिकीं चढविती पूर्ण ॥
एक नाकपुडी अवरोधून ॥ श्वासोच्छ्वास कोंडिती ॥२५॥
एक वृक्ष पाषाण घेती ॥ वर्मस्थळीं बळें ताडिती ॥
कडू तीक्ष्ण औषधें ओतिती ॥ नासिकापुटीं नेऊनियां ॥२६॥
उपाय केले बहुत पूर्ण ॥ परी जागा नोहेच कुंभकर्ण ॥
मग विरूपाक्षें किन्नरी आणून ॥ कर्णांमाजी बैसविल्या ॥२७॥
त्यांचे परम सुस्वर गायन ॥ ऐकतां शेष येईल धांवोन ॥
मग जागा होऊन कंभकर्ण ॥ सावधान बैसला ॥२८॥
जांभई दिधली भयानक ॥ मद्य प्राशिलें सकळिक ॥
दाढेखालीं पशू देख ॥ अपार घालून रगडिले ॥२९॥
अन्नमांसाचे पर्वत ॥ गिळिले राक्षसें तेव्हां बहुत ॥
मग नेत्र पुसोन पहात ॥ प्रधानांकडे ते काळीं ॥३०॥
तंव ते प्रणिपात करून ॥ सांगते झाले सर्व वर्तमान ॥
सीता आणिली हिरून ॥ तेथून सर्व कथियेलें ॥३१॥
हनुमंत लंका जाळून ॥ रामसौमित्रां आला घेऊन ॥
कालचे युद्धीं रावण ॥ पराजय पावला ॥३२॥
रावण परम चिंताक्रांत ॥ यालागीं तुम्हां उठविलें त्वरित ॥
मांडला बहुत कल्पांत ॥ आटले समस्त राक्षस ॥३३॥
उभा ठाकला कुंभकर्ण ॥ म्हणे ऐसाचि रणा जाईन ॥
मग विनवीती प्रधान ॥ राजदर्शन घेइंजे ॥३४॥
सभेसी चालिला कुंभकर्ण ॥ लंकादुर्ग त्यासी गुल्फप्रमाण ॥
वाटे आकाशासी लाविले टेंकण ॥ विमानें सुरगण पळविती ॥३५॥
लंकावेष्टित जे वानर ॥ ते तेथून पळाले समग्र ॥
देखोनि कुंभकर्णाचें शरीर ॥ कपी मूर्च्छित पडियेले ॥३६॥
रामासी म्हणे बिभीषण ॥ स्वामी हा उठविला कुंभकर्ण ॥
आश्चर्य करी रघुनंदन ॥ शरीर देखोन तयाचें ॥३७॥
बिभीषण म्हणे ते काळीं ॥ रामा याचिया जन्मकाळीं ॥
प्रळय वर्तला भूमंडळी ॥ हांक वाजली चहूंकडे ॥३८॥
मातेचिया उदरांतून ॥ भूमीसी पडला कुभकर्ण ॥
तीस सहस्र स्त्रिया जाण ॥ वदन पसरून गिळियेल्या ॥३९॥
इंद्राचा ऐरावत धरूनि ॥ येणें आपटिला धरणीं ॥
ऐरावतीचे दांत मोडूनि ॥ इंद्रासी येणें ताडिले ॥४०॥
शक्रें वज्र उचलोनि घातलें ॥ याचें रोम नाहीं वक्र जाहलें ॥
यासी निद्राआवरण पडलें ॥ म्हणोनि लोक वांचले हे ॥४१॥
असो कुंभकर्ण दृष्टीं देखोन ॥ हिमज्वरें व्यापले वानरगण ॥
एक मुरकुंडी वळून ॥ दांतखिळिया बैसल्या ॥४२॥
भोंवतें पाहे चापपाणी ॥ तों भयभीत वानरवाहिनी ॥
सर्वांचें अंतर जाणोनी ॥ मारुतीकडे पाहिलें ॥४३॥
तो निमिषांत हनुमंत ॥ अकस्मात गेला लंकेत ॥
कुंभकर्ण सभेसी जात ॥ तंव अद्‌भुत केलें वायुसुतें ॥४४॥
कुंभकर्ण तये वेळां ॥ कटीपर्यंत उचलिला ॥
राम आणि कपि डोळां ॥ तटस्थ होऊन पाहाती ॥४५॥
मद्यपानें कुंभकर्ण ॥ अत्यंत गेलासे भुलून ॥
आपणास उचलितो कोण ॥ हेंही त्यासी नेणवे ॥४६॥
मग तों सीताशोकहरण ॥ पुढती उचलून कुंभकर्ण ॥
भुजाबळें भोवंडून ॥ टाकीत होता सुवेळेसी ॥४७॥
मागुती केले अनुमान ॥ म्हणे गगनीं देऊं भिरकावून ॥
कीं लंकेवरी आपटून ॥ चूर्ण करूं सकळही ॥४८॥
मग म्हणे नव्हे हा विचार ॥ लंका चूर्ण होईल समग्र ॥
मग तो बिभीषण नृपवर ॥ नांदेल कैसा ये स्थळीं ॥४९॥
सुवेळेसी द्यावा टाकून ॥ तरी वानर होतील चूर्ण ॥
भूमंडळीं आपटूं धरून ॥ तरी धरा जाईल पाताळा ॥५०॥
ऊर्ध्वपंथेंचि ठेवून ॥ भुजाबळें भोवंडून ॥
वृक्षावरी घातला नेऊन ॥ राघवापासी परतला ॥५१॥
भय आणि शाहारे पूर्ण ॥ गेले कपीचें निघोन ॥
जैसा उगवतां सहस्रकिरण ॥ तम जाय निरसोनि ॥५२॥
कीं हनुमंतें बळ दावून ॥ वानरांसी दिधलें रसायन ॥
हिमज्वरभय दारुण ॥ निघोन गेलें सर्वही ॥५३॥
असो श्रीरामचरणीं भाळ ॥ ठेवी अंजनीचा बाळ ॥
मग सुग्रीवादि कपी सकळ ॥ धांवोन भेटती हनुमंता ॥५४॥
शब्दसुमनें स्तुतिमाळा ॥ कपी घालिती मारुतीच्या गळां ॥
म्हणती कुंभकर्ण कवेंत सांपडला ॥ तरी कां सोडिला कळेना ॥५५॥
मारुतीचा अंतरार्थ ॥ कपीतें सांगे रघुनाथ ॥
त्यास माझे हातीं मृत्य ॥ हें हनुमंत जाणतसे ॥५६॥
सिंहावलोकने निश्चिती ॥ मागील कथा परिसावी श्रोतीं ॥
कुंभकर्ण जात सभेप्रती ॥ रावणासी भेटावया ॥५७॥
बंधु सन्मुख देखोन ॥ हरुषें कोंदला दशानन ॥
कुंभकर्ण प्रणिपात करून ॥ निजस्थानीं बैसला ॥५८॥
जेंवी मेघ करी गर्जन ॥ तेवी बोले कुंभकर्ण ॥
काय संकट पडिले येऊन ॥ म्हणोनि मज जागविलें ॥५९॥
महाप्रलय मांडला ॥ की उर्वी जात होती रसातळा ॥क
िंवा कृतांत चालून आला ॥ म्हणोनि मज जागविलें ॥६०॥
सांगे रावण वर्तमान ॥ जानकी आणिली हिरून ॥
यालागीं वानरदळ घेऊन ॥ सुवेळेसी राम आला ॥६१॥
धूम्राक्ष आणि वज्रदंष्ट्री ॥ प्रहस्त प्रधान पडला समरीं ॥
मग मी युद्धा गेलो झडकरी ॥ परी पावलो पराजय ॥६२॥
मज परम संकट पडलें ॥ म्हणोनि बंधु तुज जागविलें ॥
मज चिंताव्याधीनें पीडिलें ॥ त्यासी औषध देईं तूं ॥६३॥
संकटीं बंधु पावे साचार ॥ दरिद्रकाळीं जाणिजे मित्र ॥
संशय निरसावया समग्र ॥ सद्‌गुरुचरण धरावे ॥६४॥
तम दाटले जरी घोर ॥ तरी दीपिका पाजळाव्या सत्वर ॥
येतां वैरियाचें शस्त्र ॥ वोडण पुढें करावें ॥६५॥
दुष्काळ पडतां अत्यंत ॥ दात्यापासी जावें त्वरित ॥
संकट आम्हां पडलें बहुत ॥ म्हणोनि तुज जागविलें ॥६६॥
यावरी बोले कुंभकर्ण ॥ बुद्धि कर्मानुसारिणी पूर्ण ॥
जानकी व्यर्थ आणून ॥ कुळक्षय आरंभिला ॥६७॥
राम हा वैकुंठवासी नारायण ॥ सुरांचे अवतार वानर पूर्ण ॥
हें नारदें वर्तमान ॥ पूर्वींच मज सांगितलें ॥६८॥
असो जें शुभाशुभ कर्म होत ॥ तें भोगल्याविण न चुकत ॥
पुढील होणार भविष्यार्थ ॥ तो न चुके कदाही ॥६९॥
करूं नये तें त्वां राया केलें ॥ शेवटीं सीतेस तरी भोगिलें ॥
येरू म्हणे बहुत यत्‍न केले ॥ परी ते वश न होय ॥७०॥
ती रामावेगळी तत्वतां ॥ आणिकां वश नव्हे सर्वथा ॥
कुंभकर्ण म्हणे लंकानाथा ॥ राघवरूप धरीं तूं ॥७१॥
जपोनियां कापट्य़मंत्र ॥ होईं सुंदर रघुवीर ॥
सीता होईल वश साचार ॥ क्षणमात्रें न लागतां ॥७२॥
मग बोले लंकेश्वर ॥ मी जैं निजांगें होईन रघुवीर ॥
तेव्हां दुर्वासना समग्र ॥ मावळेल माझी समूळी ॥७३॥
घरासी येतां वासरमणी ॥ तम न उरे ते क्षणीं ॥
कीं गरुड येतां सर्पश्रेणी ॥ पळती उठोनि जीवभयें ॥७४॥
तैसा मी राम होतांचि जाण ॥ वाटे परनारी मातेसमान ॥
एकवचन एकबाण ॥ एकपत्‍नीव्रती होतों ॥७५॥
याचिलागीं बंधु जाण ॥ रामसौमित्र वानरगण ॥
यांसी संहारिल्यावांचून ॥ वश नव्हे जानकी ॥७६॥
यावरी बोले कुंभकर्ण ॥ आतां गिळीन सकळ सैन्य ॥
क्षणांत रामलक्ष्मण ॥ धरून आणीन पुरुषार्थ ॥७७॥
अपार सैन्यसमुद्र ॥ सवें देत दशकंधर ॥
रावणासी नेमून सत्वर ॥ कुंभकर्ण निघाला ॥७८॥
रणां येता कुभकर्ण ॥ तेथें होते वानरगण ॥
ते अवघे गेले पळोन ॥ रामचंद्रासी सांगावया ॥७९॥
कुंभकर्ण विचारी अंतरीं ॥ मी काय लोटूं वानरांवरी ॥
जंबुकावरी जैसा केसरी ॥ धांवतां पुरुषार्थ दिसेना ॥८०॥
पिपीलिकांवरी धांवे गज ॥ कीं अळिकेवरी द्विजराज ॥
मूढसभेंत तेजःपुंज ॥ पंडित शोभा न पावे ॥८१॥
आरंभीं राक्षसदळ तुंबळ ॥ वानरांवरी धांवले चपळ ॥
कपी उठावले सकळ ॥ शिळा वृक्ष घेऊनियां ॥८२॥
युद्ध झालें अपार ॥ लोटले अशुद्धाचे पूर ॥
परी ते न मानी घटश्रोत्र ॥ म्हणे हे युद्ध कायसें ॥८३॥
मूढ अपार बोलती ॥ परी तें न भरे पंडिताचें चित्ती ॥
जैसे वृषभ परस्परें भांडती ॥ महाव्याघ्रासी न माने तें ॥८४॥
असो तेव्हां मुद्रर घेऊन ॥ रामावरी लोटला कुंभकर्ण ॥
अठरा पद्में वानरगण ॥ पर्वत पाषाण भिरकाविती ॥८५॥
पर्वतावरी पर्जन्य पडत ॥ परी तो व्यर्थ न मानी किंचित ॥
कीं कूर्मपृष्ठीवरी बहुत ॥ सुमनें वर्षतां न ढळेंचि ॥८६॥
तों शतशृंगमंडित पर्वत ॥ घेऊन भिरकावी हनुमंत ॥
तो मुष्टिघातें त्वरित ॥ फोडून टाकी कुंभकर्ण ॥८७॥
म्हणे रे मर्कटा धरी धीर ॥ तुवां जाळिलें माझें नगर ॥
म्हणोनि धांवे घटश्रोत्र ॥ हनुमंतावरी तेधवां ॥८८॥
बळें शूळ भोवंडोनि ॥ मारुतीवरी घाली उचलूनि ॥
ते वेळे वायुसुत धरणीं ॥ मूर्च्छा येऊन पडियेला ॥८९॥
ते देखोनि वाहिनीपती ॥ नीळ धांवे समीरगती ॥
कुंभकर्णाची युद्धगति ॥ देव पहाती विमानीं ॥९०॥
नीळें पर्वत वरी टाकिला ॥ तो मुष्टिघातें चूर्ण केला ॥
नीळासीं मुष्टिघात दीधला ॥ मूर्च्छित पाडिला धरणिये ॥९१॥
तों धावलें चौघे वानर ॥ जे काळासही शिक्षा करणार ॥
ऋषभ शरभ गवाक्ष वीर ॥ गंधमादन चवथा तो ॥९२॥
चौघांजणीं चार पर्वत ॥ टाकिले पैं अकस्मात ॥
ते मुष्टिघातें पिष्टवत ॥ करूनियां टाकिले ॥९३॥
शरभ गवाक्ष धरणीवरी ॥ कुंभकर्णे आपटिले स्वकरीं ॥
दोघे भिरकाविले अंबरी ॥ जगतीवरी पडियेले ॥९४॥
मग अट्टहासें गर्जे कुंभकर्ण ॥ वाटे ब्रह्मांड जाय उलोन ॥
मग वानरांतें देखोन ॥ ग्रासावया धांवला ॥९५॥
कव घालोनि अकस्मात ॥ एकदांच वानर धरी बहुत ॥
मुखीं घालूनि चावित ॥ गिळिले गणित ऐका तें ॥९६॥
ऐशीं सहस्र द्रुमपाणि ॥ असुरें गिळिले मुख पसरोनि ॥
कित्येक कर्णरंध्रांतून निघोनि ॥ पळते जाहले एकसरें ॥९७॥
उरले वानर ते वेळे ॥ रण सांडोनि पळाले ॥
गिरिकंदरीं दडाले ॥ जीवभयेंकरूनियां ॥९८॥
कित्येक तेव्हां वानरगण ॥ सूर्यसुतासी गेले शरण ॥
ते वेळीं पर्वत घेऊन ॥ सुग्रीववीर धांविन्नला ॥९९॥
विशाळ पर्वत टाकिला ॥ येरे मुद्ररें चूर्ण केला ॥
सुग्रीव म्हणे अमंगळा ॥ वृथा पुष्ट राक्षसा ॥१००॥
तुझें नासिक आणि कर्ण ॥ क्षण न लागतां छेदीन ॥
विमानीं वृंदारकगण ॥ जेणेंकरून तोषती ॥१॥
तुझा अग्रज दशकंधर ॥ पंचवटीस येऊनि तस्कर ॥
जानकी चिद्रत्‍न सुंदर ॥ घेऊनि आला चोरूनियां ॥२॥
तरी तस्करातें दंड हाचि पूर्ण ॥ छेदावें नासिक आणि कर्ण ॥
तूं रावणानुज कुंभकर्ण ॥ शिक्षा लावीन तुज आतां ॥३॥
कुंभकर्ण म्हणे सुग्रीवासी ॥ मशक आगळें बहुत बोलसी ॥
जैसा पतंग वडवानळासी ॥ विझवावया धांवत ॥४॥
मशक जाहलें क्रोधायमान ॥ म्हणे सगळा पर्वत गिळिन ॥
वृश्चिक स्वपुच्छेंकरून ॥ ताडीन म्हणे खदिरांगारा ॥५॥
ऊर्णनाळाींचा उदरतंतु ॥ तेणें केवीं बांधिजे ऐरावतु ॥
सूर्यमंडळ धगधगितु ॥ खद्योत केवी गिळिल पां ॥६॥
तैसा तूं बळहीन वानर ॥ रागें आलासी मजसामोर ॥
मत्कुणप्राय शरीर ॥ चूर्ण करीन तुझें आतां ॥७॥
ऐसें बोलतां रावणानुज ॥ पर्वत घेऊनि धांवे अर्कज ॥
कुंभकर्णाचे हृदयीं सहज ॥ येऊनियां आदळला ॥८॥
पर्वत गेला चूर्ण होऊन ॥ क्रोधें धांवे कुंभकर्ण ॥
सुग्रावासी चरणीं धरून ॥ भोवंडिला गरगरां ॥९॥
पृथ्वीवरी आपटूं पाहत ॥ तों प्रतापी सूर्यसुत ॥
पिळूनि कुंभकर्णाचा हात ॥ ऊर्ध्वपंथे उडाला ॥११०॥
ग्रहमंडळपर्यंत ॥ उडोन गेला कपिनाथ ॥
त्याहून कुंभकर्णाचा हात ॥ उंचावला तेकाळीं ॥११॥
मागुती वानेश्वर धरिला ॥ बळेंच कक्षेंत दाटिला ॥
कक्षेमाजी गुंडाळला ॥ कंटाळला दुर्गंधीनें ॥१२॥
म्हणे वाळीनें रावण ॥ कक्षेंत घालोनि केलें स्नान ॥
तो सूड आजि घेतला जाण ॥ टाकीन रगडोनि मर्कटा ॥१३॥
जयवाद्यांचा गजर ॥ होता जाहला पैं अपार ॥
रणीं आजि साधिला वानेश्वर ॥ मग घटश्रोत्र परतला ॥१४॥
संसारजाळें परम थोर ॥ त्यांत गुंतला साधक नर ॥
तो पळावया पाहे बाहेर ॥ तेवीं वानरेश्वर निघों इच्छी ॥१५॥
दुर्गंधींत पडिलें मुक्ताफळ ॥ कीं पंकगर्तेत मराळ ॥
कीं ब्राह्मणश्रोत्री निर्मळ ॥ हिंसकगृहीं कोंडिला ॥१६॥
असो मस्त जाहला कुंभकर्ण ॥ नसे तया देहस्मरण ॥
तों कक्षेंतून सूर्यनंदन ॥ न लागतां क्षण निसटला ॥१७॥
नेत्रपातें जंव हेलावत ॥ इतुक्यांत साधिलें कृत्य ॥
कुंभकर्णस्कंधी उभा ठाकत ॥ तारानाथ तेधवां ॥१८॥
दोनी विशाळ कर्ण ते वेळे ॥ दोनी करी दृढ धरिले ॥
दंतसंधीत सांपडविलें ॥ नासिक कुंभकर्णाचें ॥१९॥
कर्ण नासिक उपडोनि ॥ सुग्रीव उडाला गगनीं ॥
रामचरणांवरी येऊनि ॥ मस्तक ठेवी सप्रेम ॥१२०॥
एकचि जाहला जयजयकार ॥ देव वर्षती सुमनसंभार ॥
यशस्वी जाहला सूर्यकुमर ॥ आलिंगी रघुवीर तयातें ॥२१॥
घ्राण कर्ण नेले सूर्यसुतें ॥ परी शुद्धि नाहीं कुंभकर्णातें ॥
वर्तमान कळलें रावणातें ॥ घटश्रोत्रातें विटंबिलें ॥२२॥
परम चिंताक्रांत रावण ॥ नापिक दीधला पाठवून ॥
गगनचुंबित वंश घेऊन ॥ तयासी दर्पण बांधिला ॥२३॥
सप्तखणी महाद्वार देख ॥ त्यावरी उभा ठाके नापिक ॥
कुंभकर्णाचें सन्मुख ॥ आदर्श तेव्हां दाखविला ॥२४॥
छेदोनि नेले नासिक कर्ण ॥ दर्पणीं देखे कुंभकर्ण ॥
सुग्रीव गेला कक्षेंतून ॥ झाले स्मरण ते काळीं ॥२५॥
जैसा किंशुकीं फुलला पर्वत ॥ तैसा कुंभकर्ण दिसे आरक्त ॥
परम विटला मनांत ॥ स्वरूप आपुलें देखतां ॥२६॥
मनांत म्हणे कुंभकर्ण ॥ आतां व्यर्थ काय वांचून ॥
दशग्रीवास परतोन ॥ काय हें वदन दाखवूं ॥२७॥
कपींसहित रामलक्ष्मण ॥ गिळीन रणीं न लागतां क्षण ॥
पृथ्वी पालथी घालीन ॥ निर्दाळीन देव सर्व ॥२८॥
कुंभकर्ण परतला दळीं ॥ दांते रगडी अधपाळीं ॥
कृतांतवत हांक दीधली ॥ डळमळली उर्वी तेव्हां ॥२९॥
परतला देखोनि कुंभकर्ण ॥ पळों लागले वानरगण ॥
आले रघुपतीस शरण ॥ रक्षीं रक्षीं म्हणूनियां ॥१३०॥
दृष्टीं लक्षूनि राघव ॥ कुंभकर्णे घेतली धांव ॥
तंव तो सौमित्र बलार्णव ॥ पाचारीत तयातें ॥३१॥
म्हणे उभा राहें एक क्षण ॥ पाहें माझें शरसंधान ॥
परी तो न मानी कुंभकर्ण ॥ रामाकडे धांविन्नला ॥३२॥
परम कोपें सुमित्राकुमर ॥ कुंभकर्णावरी टाकी सप्त शर ॥
ते सपक्ष बुडाले समग्र ॥ मध्येंच गुप्त जाहले ॥३३॥
सौमित्रें टाकिले बहुत बाण ॥ परी ते न मानी कुंभकर्ण ॥
जेवीं पर्वतावरी पुष्पें येऊन ॥ पडतां आसन न चळेचि ॥३४॥
पंडितवचनें रसाळीं ॥ पाखांडी न मानी कदाकाळी ॥
तैसा कुंभकर्ण ते वेळीं ॥ न गणी शर सौमित्रांचे ॥३५॥
तों गदा घेऊनि बिभीषण ॥ बंधूवरी आला धांवोन ॥
म्हणे निर्नासिका एक क्षण ॥ मजसीं आतां युद्ध करी ॥३६॥
म्या पूर्वी बोधिला दशवक्र ॥ परी त्यासी झोंबला कामविखार ॥
तेणें भुलला तो समग्र ॥ शुद्धि अणुमात्र नसेचि ॥३७॥
गोड वचनें कडू वाटती ॥ कडू तें गोड वाटे चित्तीं ॥
एश्वर्यमद झेंडू निश्चितीं ॥ कंठी दाटला तयाचे ॥३८॥
रावणदुष्कृतवल्लीचीं फळें ॥ तुम्हांस प्राप्त जाहली शीघ्रकाळें ॥
त्याचे प्रत्युत्तर ते वेळे ॥ कुंभकर्ण ते देतसे ॥३९॥
म्हणे बिभीषणा शतमूर्खा ॥ हांससी माझ्या कर्णनासिका ॥
मी कोण हें तुज देखा ॥ नाही कळलें अद्यापि ॥१४०॥
कुळक्षयास कारण ॥ तूं मिळालास इकडे येऊन ॥
मजपुढें दावूं नको वदन ॥ क्षणें प्राण घेईन तुझा ॥४१॥
राक्षससिंहांमाजी देख ॥ तूं एक जन्मलासी जंबुक ॥
कपटिया न दाखवीं मुख ॥ कुळवना पावक तूं ॥४२॥
तुझीं शतखंडें करितों ये वेळीं ॥ परी आम्हासी द्यावया तिळांजळी ॥
तुज रक्षिलें ये काळीं ॥ कुलोत्पत्तीकारणें ॥४३॥
होई माघारा वेगेंसी ॥ निघे रामाचे पाठीसी ॥
आजि कपिसेना निश्चयेसी ॥ मी ग्रासीन क्षणार्धें ॥४४॥
ऐकूनि बंधूचें वचन ॥ माघारला बिभीषण ॥
पुढें रामावरी कुंभकर्ण ॥ मुद्रर घेऊनि धांविन्नला ॥४५॥
श्रीराम म्हणे कुंभकर्णा ॥ आजि तूं पात्र जाहलासी माझिया बाणा ॥
तुम्ही पीडिलें त्रिभुवना ॥ जाणोनि ऐसें अवतरलो ॥४६॥
तुवां जे गिळिले वानरगण ॥ ते पोट फोडोनि बाहेर काढीन ॥
तुझें जवळीं आले मरण ॥ पाहें सावधान मजकडे ॥४७॥
ऐसें बोलोनि दिनकर कुळदीप ॥ क्षण न लागतां चढवी चाप ॥
जो आदिपुरुष त्याचा प्रताप ॥ न वर्णवेचि वेदशास्त्रां ॥४८॥
रणरंगधीर रघुवीर ॥ उभा राहिला कुंभकर्णासमोर ॥
कीं निशा संपतां दिनकर ॥ उदयाचळीं विराजे ॥४९॥
म्हणे मृत्युपुरीस राहें जाऊन ॥ सवेंच पाठवितों रावण ॥
लंकेस स्थापिला बिभीषण ॥ चंद्रार्क भ्रमती गगनीं जों ॥१५०॥
यावरी बोले कुंभकर्ण ॥ तूं जन्मांतरीचा शत्रु पूर्ण ॥
हें आम्हांसी आहे ज्ञान॥ मूळची खूण सर्वही ॥५१॥
आपुलें सामर्थ्य वार्णिलें ॥ परी मजपुढें कदा न चाले ॥
कपिदळ गिळीन सगळें ॥ दांतांसी दांत न लावितां ॥५२॥
तुवां वधिले खर त्रिशिरा दूषण ॥ वाळी मारिला कपटेंकरून ॥
परी मजपुढें तो अभिमान ॥ न चले कदां मानवीया ॥५३॥
अरे निद्रार्णवीं जाहलों निमग्न ॥ नातरी नुरते त्रिभुवन ॥
तुज वीर म्हणतां जाण ॥ हांसे मज येतसे ॥५४॥
वनचरांसी पीडी कुंजर ॥ परी मृगेंद्रापुढें जर्जर ॥
कीं मेघापुढें वणवा अपार ॥ विझोनि जाय क्षणार्धें ॥५५॥
तैसें तुज येथे करीन ॥ सोडी तुझे निर्वाण बाण ॥
हें ऐकोनि रघुनंदन ॥ ओढी आकर्ण शर तेव्हां ॥५६॥
जैशा प्रळयविजा अनिवार ॥ तैसे राघवाचे येती शर ॥
असुरें मुख पसरिलें थोर ॥ गिळी अपार बाणांते ॥५७॥
भयभीत वानर तेथें ॥ विलोकिती कुंभकर्णाचे सामथ्यातें ॥
बाण गिळिले असंख्यातें ॥ नव्हे गणित तयांचे ॥५८॥
सागरीं मिळती गंगापूर ॥ तैसे मुखीं सांठवी शर ॥
मग हातीं घेऊन मुद्रर ॥ रामावरी धांविन्नला ॥५९॥
हांक फोडिली प्रचंड ॥ तेणें डळमळलें ब्रह्मांड ॥
जळचर वनचर उदंड ॥ गतप्राण जाहले ॥१६०॥
मुद्रर भोवंडी चक्राकार ॥ रामावरी घालूं पाहे असुर ॥
मग तो रणरंगधीर ॥ दिव्य शर काढीत ॥६१॥
मंत्राच्या आवृत्ति करूनी ॥ बाणाग्नीं स्थापिला प्रळयाग्नी ॥
आकर्ण ओढी ओढूनी ॥ बाण सोडी राघव ॥६२॥
मुद्ररासहित हस्त ॥ बाणें तोडिला अकस्मात ॥
भेदीत गेला गगनपंथ ॥ सपक्ष उरग जयापरी ॥६३॥
रामबाण हाचि सुपर्ण ॥ गेला हस्तसर्प घेऊन ॥
सवेंच सूर्यबीज जपोन ॥ रघुनंदन शर सोडी ॥६४॥
तेणें खंडिला दुजा हस्त ॥ गेला गगनीं अकस्मात ॥
दोन्ही भुजा भूमीवरी पडत ॥ विंध्याचळाचिया परी ॥६५॥
परी भुजा होऊनि जित ॥ जाती कपींचे भार रगडीत ॥
वानर उचलोनि पर्वत ॥ हस्त ठेंचिती असुराचे ॥६६॥
सांडूनि संग्रामाची भूमी ॥ वानर पळती गिरिवृक्षगुल्मी ॥
परी अचळ ठाण संग्रामीं ॥ रघुत्तमाचें चळेना ॥६७॥
मग काढिले दोन शर ॥ गुणीं योजोनियां सोडी सत्वर ॥
त्यांही दोन्ही चरण समग्र ॥ कटीपासूनि खंडिले ॥६८॥
चरण गडबडाट थोर ॥ खालीं पाषाण होती चूर ॥
महावृक्ष घेऊनि वानर ॥ ताडिती बळें ठायीं ठायीं ॥६९॥
असो मुख पसरोनि ते काळीं ॥ राक्षस धांवे पोटचालीं ॥
विमानीं सुरवर ते वेळीं ॥ आश्चर्य करिती तयाचें ॥१७०॥
नासिकीं लोचनी वदनीं ॥ ज्वाळा सोडी क्रोधेकरूनी ॥
इकडे भीमकाळास्त्र बाणीं ॥ अयोध्यानाथें स्थापिलें ॥७१॥
करी वायूचें खंडण ॥ ऐसा राघवाचा दिव्य बाण ॥
आकर्ण ओढी ओढून ॥ न लागतां क्षण सोडिला ॥७२॥
वजे्रं तुटे शैलशिखर ॥ तैसें बाणें उडविलें शिर ॥
भेदीत गेलें अंबर ॥ करीत प्रळयगर्जना ॥७३॥
विमानें घेऊनि पळती सुरवर ॥ भयभीत शशीदिनकर ॥
तों शिर उतरोनि सत्वर ॥ लंकेवरी पडियेले ॥७४॥
बहुत सदनें मोडून ॥ कित्येक असुर पावले मरण ॥
ते वेळीं वृंदारकगण ॥ पुष्पें वर्षती श्रीरामावरी ॥७५॥
जाहला एकचि जयजायकार ॥ विजयी जाहला रघुवीर ॥
दुंदुभि वाजवी सुरेश्वर ॥ आनंद अंबरीं न समाये ॥७६॥
धांवती सकळ वानरगण ॥ वंदिती रघुपतीचे चरण ॥
कुंभकरर्णाचें उरलें सैन्य ॥ लंकेमाजी प्रवेशले ॥७७॥
सभेसी येऊनि घायाळ ॥ वर्तमान सांगती सकळ ॥
ऐकतां रावण पडला विकळ ॥ सिंहासनावरूनि ॥७८॥
म्हणे गेलें कुंभकर्णनिधान ॥ बंधूविणें दिशा शून्य ॥
ऐसा शोकसमुद्रीं पडतां रावण ॥ आला धांवूनि इंद्रजित ॥७९॥
रावणासी सांवरून ॥ म्हणे राया पाहे विचारून ॥
या मृत्युलोकासी येऊन ॥ चिरंजीव कोण राहिला ॥१८०॥
यावरी आमुचा विपरीत काळ ॥ वानर मारिती राक्षसदळ ॥
खद्योते गिळिलें सूर्यमंडळ ॥ मशक भूगोळा हालवी ॥८१॥
पतंगपक्षेवातेंकरूनी ॥ कैसा विझाला प्रळयाग्नी ॥
भूतांनी काळ नेउनी ॥ कुटके करून भक्षिला ॥८२॥
कुंभकर्ण वीरकेसरी ॥ रणीं मारिला नरवानरीं ॥
विपरीत काळाची परी ॥ ऐसीच असे विचारा ॥८३॥
रावणाचें विंशति नेत्र ॥ पाझरती दुःखें नीर ॥
त्या काळी सहा जण वीर ॥ उभे ठाकले संग्रामा ॥८४॥
रामविजयग्रंथ विशेष ॥ युद्धकांड माजला वीररस ॥
तो श्रवण करा सावकाश ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥८५॥
रणरंगधीर रघुवीर ॥ भक्तवत्सल परम उदार ॥
अभंग अक्षय श्रीधरवर ॥ विजयी साचार सर्वदा ॥८६॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ सप्तविंशतितमोऽध्याय गोड हा ॥१८७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामचरित्र अतिसुरस ॥ परिसतां अंतःकरणीं उल्हास ॥
सांडोनि आठव विसरास ॥ राममय जाहलें ॥१॥
रघुवीरमहिमा विशेष ॥ शोधावया धांविन्नले मानस ॥
तंव ते उन्मत्त होऊनि निःशेष ॥ राममय जाहलें ॥२॥
बुद्धि धांवली वेगेंकरून ॥ गणावया जगद्वंद्याचे गुण ॥
तंव ते बौद्धरूप होऊन ॥ राममय जाहली ॥३॥
तो चित्तास आला आवेश ॥ धणी भरी वर्णावया अयोध्याधीश ॥
तें चैतन्यरूप होऊनि विशेष ॥ राममय जाहलें ॥४॥
कास घाली अहंकार ॥ पावेन रामकथाब्धीचा पार ॥
तो ब्रह्मानंदीं बुडाला साचार ॥ निरहंकार होऊनियां ॥५॥
ऐकतां रघुनाथचरित्र ॥ श्रवण होऊनि ठेले चकित ॥
त्वचा आनंदमय होत ॥ इतर स्पर्श टाकूनियां ॥६॥
राम पहावया वेळोवेळीं ॥ चक्षूंनी घेतली आळी ॥
रसना आनंदें नाचों लागली ॥ रामचरित्र वर्णावया ॥७॥
रामचरणकमळींचा आमोद ॥ सेवावया घ्राण झालें मिलिंद ॥
एवं सर्व इंद्रियवृंद ॥ रघुनाथीं लीन जाहला ॥८॥
वक्ता म्हणे दश इंद्रियांतें ॥ जिव्हेसी भाग्य आलें अद्‌भुतें ॥
रघुपतीचें गुण वर्णीते ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९॥
श्रोते म्हणती आमचे श्रवण ॥ दशइंद्रियांमाजी धन्य ॥
पुढें बोले कथानुसंधान ॥ युद्धकांड सुरस तें ॥१०॥
सत्ताविसावे अध्यायीं कथन ॥ रामें वधिला कुंभकर्ण ॥
उद्विग्न जाहला रावण ॥ तों वीर सहाजण उठिले ॥११॥
महापार्श्व आणि महोदर ॥ देवांतक नरांतक त्रिशिर ॥
अतिकाय राजपुत्र ॥ शक्रजिताचा कनिष्ठ बंधु ॥१२॥
घेऊनि चतुरंग सेना ॥ साही चालिले रणांगणा ॥
रणवाद्यें वाजती नाना ॥ ऐकतां मना भय उपजे ॥१३॥
महाद्वार उल्लंघून ॥ बाहेर निघाले साहीजण ॥
तों साही रथांवरी आणून ॥ शिरें टाकिली गृध्रांनीं ॥१४॥
ऐसा होतां अपशकुन ॥ मनीं विराले साहीजण ॥
परी वीरश्री नावरे पूर्ण ॥ वेगीं रणांगणीं पातले ॥१५॥
देखतां अमित्रांचे भार ॥ स्मरारिमित्रांचे उठिले वीर ॥
घेऊन पर्वत तरुवर ॥ समरांगणीं मिसळले ॥१६॥
राक्षसांचे झाले अस्थिपंजर ॥ क्षण माघारले असुर ॥
तंव तो नरांतक राजपुत्र ॥ तुरंगारूढ धांविन्नला ॥१७॥
अनिवार कपींचा मार ॥ बळें विदारिती वानर ॥
मृत्तिकाघटवत फोडिती शिर ॥ कीं पूगीफल चूर्ण केलें ॥१८॥
तो तुरुंग श्यामकर्ण ॥ क्षीरार्णवाचें हृदयरत्‍न ॥
कीं मुसेंत आटोनि चंद्रकिरण ॥ तुरंगोत्तम ओतिला ॥१९॥
कीं जान्हवीचे तोये घडिला ॥ कीं उच्चैःश्रव्याचा बंधु आला ॥
सुपर्णाहुन वेगें आगळा ॥ ऐसा प्रवेशला परदळी ॥२०॥
जैसी प्रळयविद्युल्लता ॥ तैसी झळके असिलता ॥
अलातचक्र जेवीं फिरतां ॥ दृष्टीं न दिसे कवणातें ॥२१॥
अश्व खर्ग क्षत्री पाहीं ॥ तिनी मिळाली एके ठायीं ॥
नरांतकें ते समयी ॥ ख्याति केली अद्‌भुत ॥२२॥
अठरा लक्ष ते क्षणीं ॥ वानर मारिले रणांगणी ॥
किंचित माघारले द्रुमपाणी ॥ तें अंगदें दुरोनि लक्षिलें ॥२३॥
अनिवार नरांतकाचा मार ॥ वानरवीर होतां समोर ॥
सहस्रांचे सहस्र ॥ घायासरिसे पाडितसे ॥२४॥
धांवे जैसा कृतांत ॥ तैसा पेटला वाळिसुत ॥
कीं वृक्षावरी अकस्मात ॥ सौदामिनी पडियेली ॥२५॥
तैसा अंगद अकस्मात आला ॥ कठोर पाणिप्रहार दीधला ॥
नरांतकाचा अंत जाहला ॥ अश्वासहित ते काळीं ॥२६॥
नरांतक पडतां चौघेजण ॥ अंगदावरी धांवले चहूंकडून ॥
महापार्श्व महोदर जाण ॥ देवांतक आणि त्रिशिर ॥२७॥
दोन पर्वत करी घेऊन॥ उभा ठाकला वाळीनंदन ॥
चौघांसी युद्ध करितां पूर्ण ॥ अंगद संकटीं पडियेला ॥२८॥
तंव ते धांवती तिघेजण ॥ वृषभ नळ वायुनंदन ॥
नळें पर्वतघायेंकरून ॥ महोदर रणीं मारिला ॥२९॥
देवांतकासमीप हनुमंत ॥ येऊन तयासी बोलत ॥
तुज देवांतक नाम सत्य ॥ कोण्या मूढें ठेविलें ॥३०॥
निर्नासिकासी नाम रतिकांत ॥ कीं जारासी नाम ब्रह्मचारी म्हणत ॥
कीं ज्याचें नांव आदित्य ॥ तो अंधारीं पडियेला ॥३१॥
जंबूक दृष्टी देखतां पळे ॥ त्यासी केसरी नाम ठेविलें ॥
दोनी नेत्र संकोच जाहले ॥ कमळनेत्र नाम तया ॥३२॥
अमंगळानाम भागीरथी ॥ अनुसूया नाम जारिणीप्रती ॥
कीं बाळविधवेसी निश्चितीं ॥ जन्मसावित्री हे नाम ॥३३॥
कोरान्न मागतां न मिळे कण ॥ तयासी इंद्र नाम ठेविलें पूर्ण ॥
जया क्षीरसिंधु नामाभिधान ॥ परी तक्रही न मिळे प्राशना ॥३४॥
अजारक्षका नाम पंडित ॥ काष्ठवाहका नाम नृपनाथ ॥
की दरिद्रियासी नाम प्राप्त ॥ कुबेर ऐसें जाहलें ॥३५॥
जैसे अजागळींचे स्तन ॥ कीं मुखमंडण बधिरकर्ण ॥
गर्भांधाचे विशाळ नयन ॥ तैसें जाण नाम तुझें ॥३६॥
वृषभासी सिंहासन ॥ श्वानासी अर्गजालेपन पूर्ण ॥
कीं दिव्यांबर परिधान ॥ जैसें उष्ट्रासी करविलें ॥३७॥
कनकवृक्ष धोत्रियासी म्हणती ॥ कीं चर्माचा केला हस्ती ॥
पक्षियासी भरद्वाज म्हणती ॥ देवातक तव नाम तैसें ॥३८॥
ऐसे बोलोनि वायुकुमर ॥ हृदयीं दिधला लत्ताप्रहार ॥
संपला देवांतकाचा संसार ॥ तों त्रिशिरा सत्वर धांविन्नला ॥३९॥
हनुमंतें वृक्ष घेऊन ॥ त्रिशिरा मरिला न लागतां क्षण ॥
ऋषभे पर्वत घेऊन ॥ महापार्श्व मारिला ॥४०॥
ऐसें अतिकाय देखोन ॥ सारथियासी म्हणे प्रेरीं स्यंदन ॥
सर्वांसी अलक्ष करून ॥ रामावरी धांविन्नला ॥४१॥
सहस्र घोडे ज्याचे रथी ॥ एके सूत्रें आंवरी सारथी ॥
अरुणासही न टिके गती ॥ नवल कपी करिती पैं ॥४२॥
अतिकायाचे स्थूळ शरीर ॥ इंद्रजिताऐसा प्रचंड वीर ॥
तया समोर जाहले पांच वानर ॥ पर्वत होती घेऊनियां ॥४३॥
गवय गवाक्ष कुमुद ॥ शरभ आणि पांचवा मैंद ॥
पर्वत टाकिती सुबुद्ध ॥ एकदांच ते काळीं ॥४४॥
अतिकायें सोडूनि बाण ॥ पर्वत टाकिले पिष्ट करून ॥
शरी खिळिले पांचही जण ॥ आरंबळत पडियेले ॥४५॥
बिभीषणासी पुसे रघुनंदन ॥ अहो हा आहे कोणाचा कोण ॥
येरु म्हणे रावणाचा नंदन ॥ नामाभिधान अतिकाय ॥४६॥
हा दिव्यरथ तेजागळा ॥ ब्रह्मदेव यासी दिधला ॥
हा अनिवार असे झाला ॥ पुरुषार्थ याचा अद्‌भुत ॥४७॥
हा कोणास नाटोपे पूर्ण ॥ तुम्हींच उठावें घेऊन धनुष्यबाण ॥
कीं पाठवावा उर्मिलाजीवन ॥ याचा प्राण घ्यावया ॥४८॥
काढिली चापाची गवसणी ॥ जेवीं निशांतीं प्रकटे तरणी ॥
कीं कुंडांतील महाअग्नि ॥ याज्ञिकें फुंकोनि चेतविला ॥४९॥
तों विनवी सुमित्रानंदन ॥ मी अतिकायासी युद्ध करीन ॥
अवश्य म्हणे सीताजीवन ॥ विजयी होई रणांगणी ॥५०॥
चाप चढवूनि सत्वर ॥ पुढें धांवे सुमित्राकुमर ॥
म्हणे रे अतिकाया तुझें स्थूल शरीर ॥ विटंबीन आजि घातें ॥५१॥
तुझे स्थूल सूक्ष्म देह दोन्ही ॥ शरें वेगळे करीन समरांगणी ॥
आतां लंकेत परतोनी ॥ कैसा जाशील माघारा ॥५२॥
कृतांताचियां मुखांत ॥ सांपडला राक्षस समस्त ॥
कुंजर गेला सिंहदरींत ॥ तो कैसा येईल माघारा ॥५३॥
काळें पाश घालूनि ॥ ओढून तुज आणिलें रणीं ॥
भुजंगाचे कवेतूनि ॥ मूषक कैसा जाईल ॥५४॥
अतिकाय म्हणे ते समयीं ॥ तूं वीर म्हणविशी पाहीं ॥
महाव्याघ्राचें सोंग पाही ॥ जंबुकें जैसे धरियेले ॥५५॥
नट नृप जाहला वेष धरून ॥ परी त्या न भीती कोणी जन ॥
वरी वैराग्य दावी पूर्ण ॥ अंतरीं मन तळमळीं ॥५६॥
अयोध्या सांडोनि लवलाहीं ॥ प्रारब्धे आणिलें ये ठायीं ॥
आतां कोणाचे पायीं ॥ जाल तुम्हीं येऊनियां ॥५७॥
स्वर्गी तुमचे पितृगण ॥ काय करिती तेथे बैसोन ॥
त्यांचा समाचार आणावया पाठवीन ॥ तुम्हांस आतां ये काळीं ॥५८॥
ऐसें ऐकोन अतिकायाचें वचन ॥ सौमित्र म्हणे सावधान ॥
आतां सांभाळीं माझे बाण ॥ तुझे प्राणहरते जे ॥५९॥
तों अतिकाय लोटी स्यंदन ॥ जो शतखणीं मंडित पूर्ण ॥
मित्रकरसंख्या वारू जाण ॥ श्वेतवर्ण योजिले ॥६०॥
सौमित्र सोडी पांच बाण ॥ नेणों पंच चपळा निघाल्या मेघांतून ॥
लंकेशपुत्रें देखोन ॥ योजिला बाण ते काळीं ॥६१॥
चापापासून सुटतां बाण ॥ तेणें पांच शर टाकिले खंडून ॥
मग सोडीत सहस्रबाण ॥ सुमित्रानंदन ते काळीं ॥६२॥
परम चपळ अतिकाया ॥ तितुके शर तोडी लवलाह्यां ॥
प्रळयमेघां परी गर्जोनियां ॥ सहस्र बाण सोडिले ॥६३॥
मग लक्षांचे लक्ष बाण ॥ सोडी सुमित्रानंदन ॥
कीं बाणांचाच पर्जन्य ॥ वर्षतसे ते काळीं ॥६४॥
तेथें गजमस्तकें विराजित ॥ मुक्तें त्याचि गारा उसळत ॥
शक्ति विद्युलता अद्‌भुत ॥ पूर वहात अशुद्धाचे ॥६५॥
तेथें शस्त्रें जाती वोसन ॥ प्रेतें वृक्ष जाती वाहोन ॥
वीरांचे हस्त विरोळे पूर्ण ॥ तळपताती ठायीं ठायीं ॥६६॥
वीरांचे दंत विखुरले बहुत ॥ तेचि वाळू असंख्यात ॥
खेटकें वरी तरत ॥ तेचि कूर्म जाणावे ॥६७॥
गजशुंडा वाहती ॥ तेचि नाडेसावजे तळपती ॥
असो ऐसी सौमित्रें केली ख्याती ॥ मान तुकाविती वानर ॥६८॥
बहुतास्त्रें नाना शस्त्रें ॥ सौमित्रावरी लंकेशपुत्रें ॥
टाकिलीं परी सौमित्रें ॥ छेदोनियां पाडिली ॥६९॥
मग सौमित्रें काढिला दिव्य बाण ॥ मुखीं ब्रह्मास्त्र स्थापून ॥
कल्पांतविजेसमान ॥ चापापासून सोडिला ॥७०॥
निमिष न लागतां साचार ॥ छेदिलें अतिकायाचें शिर ॥
झाला एकचि जयजयकार ॥ सुमनें सुरवर वर्षती ॥७१॥
बहुसाल आटिलें दळ ॥ लंकेत प्रवेशले घायाळ ॥
रावणापुढें सकळ ॥ समाचार सांगती ॥७२॥
सिंहासनारूढ रावण ॥ खालीं पडे मूर्च्छा येऊन ॥
मग इंद्रजितें धांवोन ॥ सांवरून बैसविला ॥७३॥
म्हणे माझीं साही निधानें गेली ॥ पुनः परतोन नाहीं देखिलीं ॥
अतिकायासारिखा बळी ॥ पाठिराखा तुझा गेला ॥७४॥
इंद्रजित म्हणे रायाप्रती ॥ होणार न चुके कल्पांतीं ॥
आतां युद्धासी जातो मी निश्चितीं ॥ शत्रुक्षय करावया ॥७५॥
चतुरंग दळेंसी झडकरी ॥ रणमंडळीं आला शक्रारी ॥
सेनादुर्ग ते अवसरी ॥ आपणाभोंवते रचियेले ॥७६॥
रक्तें करूनियां स्नान ॥ रक्तवर्ण वस्त्रें नेसून ॥
बिभीतकसमिधा आणोन ॥ सर्षपधान्यसंयुक्त ॥७७॥
रणमंडळीं केलें हवन ॥ आंतून निघाला स्यंदन ॥
धनुष्य तूणीर शस्त्रें पूर्ण ॥ सारथि अश्वांसमवेत ॥७८॥
त्या रथी बैसोन झडकरी ॥ मेघाआड गेला शक्रारी ॥
दुर्धर शर ते अवसरी ॥ वर्षता जाहला अपार ॥७९॥
ते बाण नव्हती संपूर्ण ॥ वर्षत विजांचा पर्जन्य ॥
शिरें आणि कर चरण ॥ कपींचीं तुटतीं तटतटां ॥८०॥
कोट्यनकोटी पडिले वानर ॥ जाहला एकचि हाहाकार ॥
एकाखालीं एक दडपती वीर ॥ परम दुस्तर ओढवलें ॥८१॥
एक पळावया योजिती ॥ तात्काळ कर चरण खंडिती ॥
रामसौमित्र तटस्थ पाहती ॥ अंगीं आदळती सायक ॥८२॥
धनुष्यें हातींची गळोनी ॥ रामसौमित्र तटस्थ पाहती ॥
अंगीं आदळती सायक ॥८२॥
धनुष्यें हातींची गळोनी ॥ रामसौमित्र पडले धरणीं ॥
लीलावतारी चापपाणी ॥ दाखवी करणी शत्रूची ॥८३॥
शतबाणें इंद्रजितें ॥ खिळिलें रामसौमित्रांतें ॥
पुराणसंख्या बाणीं अर्कजातें ॥ विंधोनि भूमी पाडिलें ॥८४॥
शास्त्रसंख्याबाणी ॥ गंधमादन पाडिला रणीं ॥
रविसंख्येनें धरणीं ॥ ऋषभ मैंद पाडिले ॥८५॥
चंद्रकळासंख्या बाणीं नीळ ॥ सागर संख्यें ऋक्षपाळ ॥
स्कंदमुखसंख्येनें नळ ॥ प्रेतवत पाडिला ॥८६॥
ऋत्ववर्धदिवससंख्याबाणी ॥ अंगद पाडिला समरांगणीं ॥
गवय गवाक्ष शरभ तीनी ॥ संवत्सरसंख्यांनीं खिळिलें पैं ॥८७॥
सोडून कळासंख्याबाण ॥ खिळिला दधिमुख पावकलोचन ॥
विद्यासंख्या सायक पूर्ण ॥ सुषेणावरी घातले ॥८८॥
रुद्रनेत्रसंख्या टाकून शर ॥ खिळिले गज केसरी वानर ॥
हेमकूट गौरमुख वीर ॥ युगसंख्यांनीं खिळियेले ॥८९॥
सुमुख दुर्मुख ज्योतिमुख ॥ यांवरी अवतारसंख्यासायक ॥
वरकड वानर जे असंख्य ॥ ते बाणसंख्यांनीं खिळियेले ॥९०॥
ऐसा करूनियां अनर्थ ॥ खालीं उतरे इंद्रजित ॥
जयवाद्यें वाजवित ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥९१॥
परम हर्षयुक्त रावण ॥ पुत्रासी देत आलिंगन ॥
म्हणे माझा प्रताप वाढविला पूर्ण ॥ तुवां एकें पुत्रराया ॥९२॥
असो वानर पडिले सर्व ॥ परी दोघे उरले चिरंजीव ॥
बिभीषण हनुमंत बलार्णव ॥ प्रियप्राण राघवाचे ॥९३॥
दोघे अत्यंत म्लानवदन ॥ स्फुंदस्फुंदोनि करिती रुदन ॥
म्हणती काळ कैसा कठिण ॥ आतां विचार कोण करावा ॥९४॥
अस्ता गेला वासरमणी ॥ प्रर्वतली घोर रजनी ॥
मग चुडिया पाजळोनि ते क्षणीं ॥ रण शाधूं निघालें ॥९५॥
महावृक्ष उन्मळले ॥ तैसे ठायीं ठायीं वीर पडले ॥
रण घुमत असे ते वेळे ॥ दोघेजण देखती ॥९६॥
तंव तो वीर जांबुवंत ॥ पडलासे आरंबळत ॥
मग तया सांवरूनि हनुमंत ॥ बैसविता जाहला ॥९७॥
जांबुवंत बोले वचन ॥ या चराचराचा निजप्राण ॥
तो सुखी असे की रघुनंदन ॥ अनुजासहित सांग पां ॥९८॥
स्फुंदस्फुंदोनी सांगे बिभीषण ॥ निचेष्टित पडले रामलक्ष्मण ॥
त्याचपरी सकळ सैन्य ॥ प्राणहीन पडलें असे ॥९९॥
मग बोले ऋक्षपाळ ॥ कोणी आणील द्रोणाचळ ॥
तरी त्या वल्लीसुवासें सकळ ॥ वीर आतां उठतील ॥१००॥
उगवला नसतां वासरमणी ॥ औषधी आणाव्या त्वरेंकरूनि ॥
ऐसें ऐकतां तये क्षणीं ॥ मारुतात्मज आवेशला ॥१॥
क्षीराब्धीचे पैलतीरीं ॥ चार कोटी योजने दूरी ॥
मारुती म्हणे तृतीय प्रहरीं ॥ औषधी वेगीं आणितों ॥२॥
बिभीषणासी हनुमंत ॥ बोले होऊन सद्‌गदित ॥
जतन करावा रघुनाथ ॥ सौमित्रासहित जीवेंसी ॥३॥
ऐसे बोलोनि हनुमंत ॥ वेगें उडाला आकाशपंथ ॥
म्हणे यशस्वी अयोध्यानाथ ॥ शक्तिदाता होईं कीं ॥४॥
चपळ पणिद्वय चरण ॥ घेत उड्डाणावरी उड्डाण ॥
कीं क्षीराब्धीप्रति सुपर्ण ॥ वैकुंठींहून जातसे ॥५॥
लक्षून मानससरोवर ॥ मराळ झेंपावें सत्वर ॥
त्याचपरी अंजनीकुमर ॥ सप्तद्वीपें ओलांडी ॥६॥
सप्तसमुद्र ओलांडून ॥ द्रोणाचळाजवळी येऊन ॥
जनकजाशोकहरण ॥ उभा ठाकला ते वेळीं ॥७॥
अगस्ति सागराचें तीरी ॥ की त्रिविक्रम बळीचे द्वारीं ॥
कीं नृपाचिया भांडारी ॥ तस्कर जैसा संचरें ॥८॥
कीं तरूजवळी येऊनि ॥ उभा ठाकला कुठारपाणी ॥
कीं निधानापासी प्रीतिकरूनि ॥ सावध उभा ठाकला ॥९॥
असो कर जोडूनि हनुमंत ॥ द्रोणाचळातें स्तवित ॥
म्हणे तूं परोपकारी पर्वत ॥ पुण्यरूप नांदसी ॥११०॥
तुझें करितांचि स्मरण ॥ सकळ रोग जाती पळोन ॥
तरी शरजालीं रामलक्ष्मण ॥ इंद्रजितें पाडियेले ॥११॥
तूं जीवनदाता सत्य ॥ त्रिभुवनामाजी यथार्थ ॥
कीर्ति ऐकोनियां धांवत ॥ मी याचक आलों असें ॥१२॥
औषधी देऊनियां निर्मळ ॥ मज बोळवावें तत्काळ ॥
तंव तो प्रत्यक्ष मूर्तिमंत शैल ॥ बोलता जाहला कपीसी ॥१३॥
म्हणे मर्कटा आलासी कोठून ॥ कैंचा राम कैंचा लक्ष्मण ॥
देवांस औषधी दुर्लभ जाण ॥ तुज कोठून प्राप्त होती ॥१४॥
धरूनि माझा आश्रय ॥ मर्कटा तूं येथेंचि राहें ॥
त्यावरी तो राघवप्रिय ॥ काय बोलता जाहला ॥१५॥
म्हणे पाषाणहृदयी तूं द्रोण ॥ मंदबुद्धि मूढ मलिन ॥
कार्याकार्य तुजलागोन ॥ निर्दया कैसें समजेना ॥१६॥
वायसा काय मुक्ताहार ॥ मद्यपीयास काय तत्त्वविचार ॥
निर्दयासी धर्मशास्त्र ॥ सारासार समजेना ॥१७॥
मांसभक्षकास नुपजे दया ॥ हिंसकास कैंची माया ॥
उपरति पैशून्यवादिया ॥ कदाकाळें नसेचि ॥१८॥
कृपणासी नावडे धर्म ॥ जारासी नावडे सत्कर्म ॥
निंदकासी नावडे प्रेम ॥ भजनमार्ग कदाही ॥१९॥
कीर्तन नावडे भूतप्रेतां ॥ दुग्ध नावडे नवज्वरिता ॥
टवाळासी पैं तत्वतां ॥ तपानुष्ठान नावडे ॥१२०॥
तैसा तु अत्यंत निष्ठुर ॥ रामभजन नेणसी पामर ॥
तुज न लागतां क्षणमात्र ॥ उचलोनि नेतो लंकेसी ॥२१॥
शेषाकार पुच्छ पसरून ॥ द्रोणाचळ बांधिला आंवळून ॥
तत्काळचि उपडोन ॥ करतळीं घेऊन चालला ॥२२॥
उगवल्या असंख्यात सौदामिनी ॥ तैसा पर्वत दिसे दुरूनि ॥
कीं करी घेऊनियां तरणि ॥ हनुमंत वीर जातसे ॥२३॥
कीं सुधारसघट नेता सुपर्ण ॥ लीलाकमल उचली पूर्ण ॥
कीं सहस्रवदनें उर्वी उचलोन ॥ सर्षप्राय धरिली शिरीं ॥२४॥
कीं कनकताट द्रोणाचळ ॥ वल्ल्य़ा तेचि दीप तेजाळ ॥
पाजळूनियां अंजनीबाळ ॥ ओंवाळू येत रामातें ॥२५॥
चतुर्थ प्रहरीं ब्राह्मी मुहूर्ती ॥ सुवेळेसी आला मारुति ॥
तंव तो नूतनलंकापति ॥ सामोरा धांवे आनंदे ॥२६॥
तो सुटला शीतळ प्रभंजन ॥ चालिला वल्लींचा सुवास घेऊन ॥
त्या वातस्पर्शे रामलक्ष्मण ॥ सेनेसहित ऊठिले ॥२७॥
रजनी संपता तात्काळ ॥ किरणांसहित उगवे रविमंडळ ॥
तैसा राम तमालनीळ ॥ वानरांसमवेत ऊठला ॥२८॥
कोणाचे तनूवरी साचार ॥ घाय न दिसे अणुमात्र ॥
असो द्रोणाचळासी वायुपुत्र ॥ घेऊन मागुतीं उडाला ॥२९॥
लीलाकंदुक खेळे बाळ ॥ तैसा पर्वत झेली विशाळ ॥
पूर्वस्थळीं ठेवून तत्काळ ॥ सुवेळेसी पातला ॥१३०॥
देवांसहित शक्र बैसत ॥ तैसा कपिवेष्टित रघुनाथ ॥
सद्रद होवोनि हनुमंत ॥ रामचरणीं लागला ॥३१॥
जाहला एकचि जयजयकार ॥ प्रेमें दाटला रघुवीर ॥
हृदयी धरिला वायुकुमर ॥ तो न सोडीच सर्वथा ॥३२॥
स्कंदासी भेटे उमावर ॥ कीं इंद्रा आलिंगी जयंतपुत्र ॥
कीं संजीवनी साधितां पवित्र ॥ गुरु कचासी आलिंगी ॥३३॥
हनुमंताचें निजवदन ॥ क्षणक्षणां कुरवाळित रघुनंदन ॥
धन्य धन्य आजिचा दिन ॥ स्वामीगौरव लाहिजे तुवां ॥३४॥
श्रीराम म्हणे मारुतीसी ॥ सर्वांचा प्राणदाता तूं होसी ॥
सरली नाही जो निशी ॥ पर्वत तुवां आणिला ॥३५॥
बाळक होतां व्यथाभूत ॥ जनक जाऊनि औषधें आणित ॥
बा रे तैसेंच केले निश्चिंत ॥ प्रताप अद्‌भुत न वर्णवे ॥३६॥
ऐसें बोलता रघुनंदन ॥ सकळ कपी म्हणती धन्य धन्य ॥
स्वामीगौरवापुढें पूर्ण ॥ सुधारसपान तुच्छ पैं ॥३७॥
सुग्रीवादि कपी धांवती ॥ हनुमंतासी दृढ हृदयीं धरिती ॥
वानरांसी म्हणे किष्किंधापति ॥ यावरी काय पाहतां ॥३८॥
आतां लंकेवरी जाऊन ॥ सकळ सदना लावा अग्न ॥
अष्टदशपद्में वानर घेऊन ॥ नळ नीळ मारुति धांविन्नले ॥३९॥
गगनचुंबित तैलकाष्ठें ॥ कपींनी चुडी पाजळिल्या नेटें ॥
कीं ते रामभवानीचे दिवटे ॥ गोंधळ घालिती रणांगणी ॥१४०॥
चुडी घेऊनि समग्र ॥ भुभुःकारें गर्जविले अंबर ॥
जय जय यशस्वी रघुवीर ॥ म्हणोनी धांवती सर्वही ॥४१॥
लंकादुर्ग ओलांडून ॥ आंत प्रवेशले वानरगण ॥
तो अद्‌भुत सुटला प्रभंजन ॥ चुडिया लाविती एकसरें ॥४२॥
वायूचे अद्‌भुत कल्लोळ ॥ आकाशपंथें चालिली ज्वाळ ॥
लंकेमाजी हलकल्लोळ ॥ पळती लोक सर्व पैं ॥४३॥
धूर अद्‌भुत दाटलासे ॥ तेथे कोणा कोणी न दिसे ॥
ज्वाळा धांवती आवेशें ॥ लंका सर्व ग्रासावया ॥४४॥
कोट्यावधि घरें जळती ॥ राक्षस स्त्रियांसह आहाळती ॥
आळोआळीं उभे असती ॥ चुडी घेऊन वानर ॥४५॥
दृष्टीं देखतां रजनीचर ॥ चुडींनी भजिती वानर ॥
तो दशमुखासी समाचार ॥ दूत सत्वर सांगती ॥४६॥
हनुमंतें आणूनि द्रोणाचळ ॥ सजीव केले वैरी सकळ ॥
लंकेंत प्रवेशलें कपिदळ ॥ जाळिली सकळ मंदिरें ॥४७॥
मग जंघ प्रजंघ क्रोधन ॥ विरूपाक्ष शोणिताक्ष राजनंदन ॥
कुंभनिकुंभांप्रति रावण ॥ म्हणे धांवारे सत्वर ॥४८॥
सिद्ध करूनियां दळभार ॥ कुंभ निकुंभ धांवती सत्वर ॥
घालोनियां पर्जन्यास्त्र ॥ अग्नि समग्र विझविला ॥४९॥
जैसें कलेवर सांडोनि जाती प्राण ॥ तैसे लंकेबाहेर आले कपिगण ॥
रणभूमीसी सर्व मिळोन ॥ युद्धालागीं सरसावले ॥१५०॥
आले देखोनि असुरभार ॥ सेनामुखीं होता वाळिकुमर ॥
तो पर्वत घेऊन सत्वर ॥ क्रोधनावरी धांविन्नला ॥५१॥
बळें पर्वत दिधला टाकून ॥ रथासहित चूर्ण जाहला क्रोधन ॥
तों जंघ प्रजंघ विरूपाक्ष दारुण ॥ आले धांवूनि अंगदावरी ॥५२॥
अंगदें विशाळ वृक्ष उपडोनी ॥ दोघे झोडून पाडिले धरणी ॥
मग विरूपाक्षें निजबाणीं ॥ वानर बहुत खिळियेले ॥५३॥
तों मैंद पर्वत घेऊनि धांविन्नला ॥ अकस्मात विरूपाक्षावरी टाकिला ॥
विरूपाक्ष प्राणासी मुकला ॥ शरभें वधिला शोणिताक्ष ॥५४॥
मग तो कुंभकर्णाचा नंदन ॥ कुंभ पुढें आला धांवोन ॥
धनुष्य ओढोनि आकर्ण ॥ नव बाण सोडिले ॥५५॥
त्या नव शरप्रहारेंकरूनि ॥ मैंद कपी खिळिला समरांगणीं ॥
शरभ विंधिला दोन बाणीं ॥ मूर्च्छित धरणीं पडियेला ॥५६॥
तों धांवे वाळिसुत ॥ घेऊन विशाळ पर्वत ॥
त्याचे कुंभे खिळिले हस्त ॥ अचळासहित रणभूमीं ॥५७॥
संकट पडियेलें बहुत ॥ अंगद राहिला तटस्थ ॥
वानरीं हांक केली त्वरित ॥ राघवापासीं ते काळीं ॥५८॥
ऐकोनि गजकिंकाट देख ॥ आवेशें चपेटे मृगनायक ॥
यापरी किष्किंधापाळक ॥ कुंभहृदयीं आदळला ॥५९॥
कुंभाचें चाप घेतले हिरून ॥ मोडून कुटके केले पूर्ण ॥
मल्लयुद्धास दोघेजण ॥ प्रवर्तले ते काळीं ॥१६०॥
एक मुहूर्तपर्यंत ॥ मल्लयुद्ध दोघांशी अद्‌भुत ॥
अर्कजे हृदयीं मुष्टिघात ॥ कुंभासी बळें दिधला ॥६१॥
तेणें हृदय शतचूर्ण ॥ कुंभाचा तात्काळ गेला प्राण ॥
तंव तो निकुंभ आवेशोन ॥ सुग्रीवावरी धांविन्नला ॥६२॥
तों पर्वत सबळ उचलून ॥ वेगें धांवे सीताशोकहरण ॥
अचल दिधला भिरकावून ॥ निंकुंभें तो चूर्ण केला ॥६३॥
तेणें हनुमंत परभ क्षोभला ॥ विशाळ तरु त्यावरी टाकिला ॥
तोही निकुंभें तोडिला ॥ क्षणमात्र न लागतां ॥६४॥
निकुंभें परिघ लवलाही ॥ घेऊन ताडिला मारुतिहृदयीं ॥
पळमात्र मूर्च्छना ते समयीं ॥ आली हनुमंतास ते काळीं ॥६५॥
सवेंचि धांवे अंजनीबाळ ॥ शतशृंगाचा उपटिला अचळ ॥
निकुंभावरी टाकिला तात्काळ ॥ चूर्ण जाहला निकुंभ ॥६६॥
घायाळें पळती लंकेत ॥ रावणासी वर्तमान करिती श्रुत ॥
ऐकतांचि तो चिंताक्रांत ॥ दशवक्र जाहला पैं ॥६७॥
मग विंशतिनेत्र तिघे वीर ॥ परम प्रतापी समरधीर ॥
खराक्ष विशालाक्ष असुर ॥ मकराक्ष तो तिसरा ॥६८॥
तिघांसी म्हणे दशवदन ॥ तुम्हीं माजवावें रण ॥
ते तात्काळ रथारूढ होऊन ॥ सेनेसहित निघाले ॥६९॥
रणतुरें गर्जती अपार ॥ रणमंडळीं पातले सत्वर ॥
तों शिळा द्रुम घेऊन वानर ॥ एकदांचि उठावले ॥७०॥
येरयेरां पाचारिती ॥ उसणे घाय सवेंच देती ॥
असुरांची पोटें फाडिती ॥ वानर नखे घालोनियां ॥७१॥
कुंत असिलता परिघ ॥ असुर टाकिती शस्त्रें सवेग ॥
तेणें विदारूनि आंग ॥ कपी पडती समरांगणी ॥७२॥
कपींवीरीं केलें आगळें ॥ असुरभार मागें लोटले ॥
देखोन मकराक्ष ते वेळे ॥ बाण वर्षत धांवला ॥७३॥
जैशा पर्जन्यधारा अपार ॥ तैसा मकराक्ष वर्षे शर ॥
अपार भंगले वानर ॥ पाहे रघुवीर दुरूनी ॥७४॥
मान तुकावी सीतारमण ॥ म्हणे हा वीर प्रवीण ॥
कोदंड चढवोनि आपण ॥ जगद्वंद्य ऊठिला ॥७५॥
कोदंड ओढिता तये क्षणीं ॥ झणत्कारिल्या लघु किंकिणी ॥
एकचि बाण ते क्षणीं ॥ दशकंठरिपूनें सोडिला ॥७६॥
मकराक्षाचें बाणजाळ ॥ एकेचि शरें छेदिलें तत्काळ ॥
जेवीं उगवता सूर्यमंडळ ॥ भगणे सकळ लोपती ॥७७॥
एक उठतां विनायक ॥ असंख्य विघ्नें पळती देख ॥
कीं सुटतां चंडवात सन्मुख ॥ जलदजाल वितुळे पैं ॥७८॥
एक विष्णुनामेंकरून ॥ असंख्य दुरितें जाती जळोन ॥
कीं चेततां कृशान ॥ असंख्य वनें दग्ध होती ॥७९॥
कीं मूर्खाचे शब्द बहुुत ॥ एकाच शब्दें खंडी पंडित ॥
कीं सिंहनादें गज समस्त ॥ गतप्राण होती पैं ॥१८०॥
हृदयी प्रकटतां बोध ॥ सहज पळे काम क्रोध ॥
कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ॥ क्षुद्रानंद सर्व विरती ॥८१॥
तेवीं रामबाणें एकेंचि सबळ ॥ तोडिलें मकराक्षाचें शरजाळ ॥
मग त्यास मुक्ति द्यावया तत्काळ ॥ दिव्य शर काढिला ॥८२॥
मकराक्षाचा कंठ लक्षून ॥ शर चालिला जैसा सुपूर्ण ॥
क्षणमात्रें कंठ छेदून ॥ आकाशपंथें उडविला ॥८३॥
तों विशालाक्ष आणि खराक्ष ॥ त्यांहीं पाचारिला कमलदलाक्ष ॥
जो सर्वात्मा सर्वसाक्ष ॥ विरूपाक्ष ध्याय जया ॥८४॥
असुर धांवती लवलाहे ॥ म्हणती सर्वदा तुज कैंचा जय ॥
अकस्मात काकतालन्याय ॥ मकराक्ष तुवां मारिला ॥८५॥
ऐसें बोलून दोघेजण ॥ सोडिती रामावरी प्रचंड बाण ॥
जैसें मृगेंद्रापुढें येऊन ॥ मांडिलें ठाण मार्जारे ॥८६॥
कीं सज्ञान पंडितापुढें ॥ बोलावया आलीं मूढें ॥
कीं जंबुक आपुले पवाडे ॥ व्याघ्रापुढें दावितसे ॥८७॥
कीं उष्ट्रांनी ब्रीद बांधोन ॥ तुंबरापुढें मांडिलें गायन ॥
तैसें राक्षसी संधान ॥ रामापुढें आरंभिलें ॥८८॥
दोघांही शर सोडिले अपार ॥ तितुके निवारूनि श्रीरघुवीर ॥
प्रळयचपळेऐसे थोर ॥ दोन शर काढिले ॥८९॥
ते धनुष्यावरी योजून ॥ अकस्मात सोडी रघुनंदन ॥
दोघांची कंठनाळे छेदून ॥ निराळमार्गे पैं नेलीं ॥१९०॥
कळला रावणासी समाचार ॥ परत्र पावले त्रय असुर ॥
तत्काळ महावीर ॥ सेनेसहित धांविन्नला ॥९१॥
होम करूनि रणमंडळी ॥ त्यांतून एक कृत्या निघाली ॥
रथीं बैसोन ते वेळीं ॥ अकस्मात उडाली ॥९२॥
त्या कृत्येआड बैसोन ॥ शक्रारि सोडी तेव्हां बाण ॥
म्हणे सर्वांसी खिळिन ॥ वानरगण भयभीत ॥९३॥
मग लोकप्राणेश येउनी ॥ सांगे जगद्वंद्याचे कर्णीं ॥
म्हणे अंगिरास्त्रेंकरूनी ॥ कृत्या छेदोनि टाकिजे ॥९४॥
कृत्येआड बैसोन ॥ इंद्रजित करी संधान ॥
रामें तात्काळ मंत्र जपोन ॥ अंगिरास्त्र सोडिलें ॥९५॥
तेणें कृत्या भस्म झाली झडकरी ॥ जैसा बोध प्रवेशतां अंतरीं ॥
दुर्वासना पळे बाहेरी ॥ तृष्णा कल्पना घेउनियां ॥९६॥
कीं प्रकटतां वासरमणि ॥ तम निरसे मूळींहूनी ॥
तैसा कृत्या छेदितां धरणीं ॥ इंद्रजित उतरला ॥९७॥
रणीं प्रकट उभा राहूनी ॥ अपार शर सोडी रावणी ॥
तो दुरात्मा देखूनि तत्क्षणीं ॥ वानर सर्व क्षोभले ॥९८॥
घेऊनियां महापर्वत ॥ रागें धांवे अंजनीसुत ॥
गदा घेऊनियां त्वरित ॥ बिभीषण चौताळला ॥९९॥
परिघ हातीं घेउनी ॥ मैंद धांवे क्रोधें करूनी ॥
कौमोदकी आकळोनी ॥ धन्वंतरीं पुढं जाहला ॥२००॥
शतघ्नी घेऊन सत्वर ॥ धांवे तो ऋषभ वानर ॥
शरभ धांवे घेऊनि चक्र ॥ गंधमादन शक्ति पैं ॥१॥
जांबुवंत घेऊनि गिरि थोर ॥ अंगदें उपडिला महातरुवर ॥
नीळ घेऊनियां तोमर ॥ शत्रूवरी धांविन्नला ॥२॥
नळें उचलोनि महाशिळा ॥ सुग्रीव पर्वत घेऊन धांविन्नला ॥
कुमुद हांक देऊनि पुढें जाहला ॥ लोहपट्टिश घेऊनियां ॥३॥
सौमित्रें चाप ओढून ॥ टाकिले तेव्हां तीन बाण ॥
शत शत दारुण ॥ रघुत्तमें टाकिले ॥४॥
इतुकी शस्त्रवृष्टि होत ॥ परी ते न गणीच इंद्रजित ॥
शस्त्रें तोडून समस्त ॥ बाण बहुत सोडिले ॥५॥
अष्टादश पद्में वानर ॥ निजबाणीं केले जर्जर ॥
लक्षोनियां रामसौमित्र ॥ दारुण शर सोडिले ॥६॥
रामलक्ष्मणांसहित सकळ ॥ कपिदळ इंद्रजितें केले विकळ ॥
पुरुषार्थ करून तत्काळ ॥ इंद्रजित परतला ॥७॥
जयवाद्यें वाजवित ॥ लंकेत प्रवेशे शक्रजित ॥
पितयास करूनी प्रणिपात ॥ वार्ता समूळ सांगितली ॥८॥
रावण म्हणे शक्रजितासी ॥ तूं क्षणक्षणां शत्रु मारिसी ॥
दिनांती नक्षत्रें आकाशीं ॥ मागुती तैसे ऊठती ॥९॥
वरि वरि जळे तृण ॥ परि अंकुर फुटती भूमीतून ॥
त्यावरी शक्रजित प्रतिवचन ॥ काय बोलता जाहला ॥२१०॥
म्हणे आतां रामलक्ष्मण ॥ सेनेसहित येतों वधून ॥
तरीच तुम्हां दावीन वदन ॥ प्रतिज्ञा पूर्ण माझी हे ॥११॥
हे न घडे जरी गोष्टी ॥ तरी तुमची आमची हेचि भेटी ॥
मम पितयासी नमून उठाउठीं ॥ इंद्रजित चालिला ॥१२॥
सिद्ध करूनि चतुरंग दळ ॥ युद्धासी चालिला उतावीळ ॥
जैसा सरितापूर ॥ तुंबळ ॥ वर्षाकाळीं धांवतसे ॥१३॥
तीन वेळ संग्राम करूनि ॥ इंद्रजित गेला जय घेऊनि ॥
मागुती आला चौथेनि ॥ रणमेदिनी माजवावया ॥१४॥
युद्धकांड परम सुरस ॥ जेथें थोर माजे वीररस ॥
तें चतुर श्रोते सावकाश ॥ अत्यादरें परिसोत ॥१५॥
रणरंगधीरा रामचंद्रा ॥ सुवेळाचळवासी प्रतापरुद्रा ॥
श्रीधरवरदा आनंदसमुद्रा ॥ ब्रह्मानंदा जगद्‌गु ॥१६॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टविंषतितमोऽध्याय गोड हा ॥२१७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय एकोणतिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रामकथा परम पावन ॥ सुधारसाहूनि गोड गहन ॥
देव करिती सुधारसपान ॥ परी कल्पांतीं मरण न चुकेचि ॥१॥
अमृत गोड लागे रसनेसी ॥ ते तृप्त न करी कर्णनेत्रांसी ॥
रामकथा नव्हे तैसी ॥ सर्व इंद्रियांसी तृप्त करी ॥२॥
सुधारस सेवितां मद चढे ॥ कथामृतें मद मत्सर झडे ॥
त्रिविधतापदुःख सांकडें ॥ सहसा न पडे सद्‌भक्तां ॥३॥
कथामृत करितां श्रवण ॥ जे करणार सुधारसपान ॥
त्यांचिये मस्तकीं ठेवूनि चरण ॥ कथा नेत पलीकडे ॥४॥
अमृत सदा इंद्र भक्षित ॥ सर्व लोकी रामकथामृत ॥
स्वर्गी राहणार समस्त ॥ सदा इच्छिती रामकथा ॥५॥
ते कथासुधारसपान ॥ श्रवण करा तुम्हीं भक्तजन ॥
गतकथाध्यायीं रावणी येऊन ॥ रणमंडळीं उभा ठाकला ॥६॥
घेऊनि शिळा तरुवर ॥ वर्षों लागले रीस वानर ॥
सेनामुखीं रुद्रावतार ॥ उभा देखिला इंद्रजितें ॥७॥
परम दुरात्मा तो रावणी ॥ अंतरीं कापट्यविद्या स्मरूनि ॥
कृत्रिम जानकी निर्मूनी ॥ रथावरी बैसविली ॥८॥
तप्तकांचनर्णी ते वेल्हाळ ॥ वस्त्राभरणीं मंडित सकळ ॥
मुखशशांक अति निर्मळ ॥ विराजे सर्व लक्षणीं ॥९॥
हें कृत्रिमरूप निर्मिलें ॥ जें कोणासी कदा न कळे ॥
बहु विचक्षण जरी आले ॥ तेही साच मानिती ॥१०॥
असो कृत्रिमरूप निर्मोनी ॥ इंद्रजित म्हणे मारुतीलागुनी ॥
अरे पाहा हे जनकनंदिनी ॥ तुझी स्वामिणी कीं वानरा ॥११॥
हे रामाची अंगना होय ॥ इणेंचि आमुचा केला कुळक्षय ॥
त्रेतायुगामाजी पाहें ॥ कृत्या केवळ जन्मली ॥१२॥
पंचवटीपासून साचार ॥ इजकरितां संहारिले असुर ॥
प्रहस्त अतिकाय महोदर ॥ देवांतक नरांतक ॥१३॥
कुंभकर्णादि यामिनीचर ॥ इनेंचि ते ग्रासिले समग्र ॥
हे अत्यंत सुंदर ॥ म्हणोनि रायें आणिली ॥१४॥
वृंदावनफळ दिसे सुढाळ ॥ फणस म्हणोनि घेतले कनकफळ ॥
मुक्तहार म्हणोनि शंखपाळ ॥ सर्प हातीं धरियेला ॥१५॥
कीं रत्‍नें सुंदर म्हणोन ॥ खदिरांगार घेतलें भरून ॥
कीं नक्षत्रबिंबे जळी देखोन ॥ व्यर्थ जाळें पसरिलें ॥१६॥
इयेतें लंकेसी आणून ॥ व्यर्थ कष्टला दशानन ॥
हे पापिणी कलहा कारण ॥ राक्षसवन जाळिलें ॥१७॥
ऐसी ही परम चांडाळीण ॥ इसी काय व्यर्थ ठेवून ॥
तत्काळ शस्त्र काढून ॥ कृत्रिमसीता वधियेली ॥१८॥
सीतेचे शिर खंडून ॥ दाखवी मारुतीलागून ॥
म्हणे रामासी सांग जाऊन ॥ जाईं उठून अयोध्ये ॥१९॥
ऐसें बोलून इंद्रजित ॥ निकुंभिलेसी गेला त्वरित ॥
हवन आरंभिलें अद्‌भुत ॥ अक्षय्य रथ काढावया ॥२०॥
असो इकडे अंजनीनंदन ॥ जानकी वधिली हे देखून ॥
वक्षस्थळ बडवून ॥ मूर्च्छित पडे धरणीये ॥२१॥
घटिका एकपर्यंत ॥ निचेष्टित पडिला हनुमंत ॥
सावध होऊनि किंचित ॥ शोक करिता जाहला ॥२२॥
स्फुंदस्फुंदोनि रडे मारुती ॥ आतां काय सांगू मी राघवाप्रती ॥
सीतेकारणें अहोरात्री ॥ स्वामी माझा कष्टतसे ॥२३॥
सीतेचें स्वरूप म्हणोन ॥ हृदयी धरी वृक्ष पाषाण ॥
मित्रसुत मित्र करून ॥ शक्रसुत वधियेला ॥२४॥
प्रयत्‍न करूनियां बहुत ॥ म्यां सीता शोधिली यथार्थ ॥
वार्ता सांगोनि रघुनाथ ॥ सुखी केला ते काळीं ॥२५॥
तैंपासोनि सीताशोकहरण ॥ मज नाम ठेवी रघुनंदन ॥
तो हा मी समाचार घेऊन ॥ कैसा जाऊं स्वामीपासीं ॥२६॥
शरजाळीं पाडिलें शक्रजितें ॥ तैं घेऊन आलों द्रोणपर्वतातें ॥
संतोषोनि रघुनाथें ॥ मज बहुत गौरविलें ॥२७॥
ते कष्ट सर्व गेले व्यर्थ ॥ मी अभागी होय यथार्थ ॥
वार्ता ऐकतां रघुनाथ ॥ काय करील कळेना ॥२८॥
म्यां पूर्वी सांगितलें रघुनाथा ॥ सुखी आहे ननकदुहिता ॥
आतां जानकी वधियेली ही वार्ता ॥ रामचंद्रासी केवीं सांगूं ॥२९॥
जेणें पूर्वीं दिधलें बहुत धन ॥ तेणेंचि पुढें घेतलें हिरून ॥
जेणें केलें बहुत पाळण ॥ तेणेंचि शिर छेदिलें ॥३०॥
सुख दिधलें जन्मवरी ॥ तेणेंचि लोटिलें दुःखसमुद्रीं ॥
जळत घरांतून काढिले बाहेरी ॥ तेणेंचि शिर छेदिलें ॥३१॥
तृषाक्रांत प्राणी पडियेला ॥ तया जीवन देऊन वांचविला ॥
सवेंच त्याचा वध केला ॥ शस्त्र घेऊनि स्वहस्ते ॥३२॥
तैसा मी रामाप्रति जाऊन ॥ कैसें सांगू हे वर्तमान ॥
मध्येंच गोष्टी ठेवितां झांकोन ॥ तरी दूषण लागतसे ॥३३॥
ऐसें विचारी हनुमंत ॥ सत्वर आला जेथें रघुनाथ ॥
अधोवदनें स्फुंदत ॥ भयभयीत कपी झाले ॥३४॥
गजबजिले रामलक्ष्मण ॥ मारुतीस पुसती वर्तमान ॥
हनुमंत वक्षस्थळ बडवून ॥ आक्रंदोनि सांगतसे ॥३५॥
जानकी आणूनि रणांगणीं ॥ इंद्रजितें टाकिली वधोनी ॥
ऐसें ऐकतां चापपाणि ॥ दुःखेंकरूनि उचंबळे ॥३६॥
आकर्णनयन चांगले ॥ ते अश्रु स्रवों लागले ॥
हाहाःकार ते वेळे ॥ रामसेनेंत जाहला ॥३७॥
मंगळरूप तो रघुनंदन ॥ मंगळभगिनीचे आठवूनि गुण ॥
विलाप करितां लक्ष्मण ॥ येऊनि चरणीं लागला ॥३८॥
आकर्णनयन चांगले ॥ परब्रह्म मूस ओतले ॥
त्या जगद्वंद्याचीं चरणकमलें ॥ सौमित्रबाळें वंदिली ॥३९॥
म्हणे ब्रह्मांडनायका रघुपति ॥ मिथ्या मायेची कायसी खंती ॥
आकारा आले ते पुढती ॥ नाश पावेल निर्धारे ॥४०॥
विवेकवज्र घेऊन ॥ मोहपर्वत करावा चूर्ण ॥
सद्‌गुरुवसिष्ठें शिकवण ॥ हेंच पूर्वीं शिकविली ॥४१॥
तूं देवाधिदेव परब्रह्म ॥ अज अजित आत्माराम ॥
तुझे मायेचा हा संभ्रम ॥ मिथ्यामय लटिकाचि ॥४२॥
जानकी पावली मरण ॥ तुज कोठें जाईल टाकोन ॥
दीपासी प्रभा वोसंडोन ॥ जाईल हें तों घडेना ॥४३॥
कनकासी टाकूनि कांती ॥ जाऊन राहील केउती ॥
रत्‍नांस सांडूनि दीप्ती ॥ कोठें परती जाईल ॥४४॥
अनादि तूं तिचा नाथ ॥ तुजचि ते पावेल यथार्थ ॥
जैसा पार्वतीनें कैलासनाथ ॥ पुनः उपजोनि वरियेला ॥४५॥
आतां यावरी ऐसें करीन ॥ सहपरिवारें वधीन रावण ॥
बंदीचें देव सोडवीन ॥ बिभीषण स्थापीन लंकेसी ॥४६॥
ऐसें बोलतां लक्ष्मण ॥ राम पाहे अधोवदन ॥
चिंताक्रांत वानरगण ॥ तटस्थरूप पाहती ॥४७॥
तो बिभीषणाचे दोघे प्रधान ॥ आले जानकीची शुद्धि घेऊन ॥
हांसतचि बिभीषण ॥ आला रामास सांगावया ॥४८॥
म्हणे जगद्वंद्या चापपाणि ॥ सुखी आहे जनकनंदिनी ॥
म्यां लंकेसी दूत पाठवूनि ॥ समाचार आतां आणविला ॥४९॥
इंद्रजित परम कपटी ॥ लटिकीच वधिली सीता गोरटी ॥
हनुमंत निष्कपट पोटीं ॥ त्यासी सत्यचि वाटलें ॥५०॥
ऐकतां बिभीषणाचें वचन ॥ जयजयकारें गर्जती कपिगण ॥
वदनें टवटवलीं पूर्ण ॥ आनंद गगनीं न समाये ॥५१॥
उदयाचळीं उगवे गभस्ति ॥ एकदांचि निघे तमाची बुंथि ॥
तैसी जाहली दुःखनिवृत्ति ॥ बिभीषणें वार्ता सांगतां ॥५२॥
कीं हृदयी प्रगटतां वेदांतज्ञान ॥ सहपरिवारें जाय अज्ञान ॥
कीं गृहस्वामी उठतां देखोन ॥ तस्कर पळती अवघेचि ॥५३॥
कीं क्षुधित पीडिला अन्नाविण ॥ तों क्षीराब्धि पुढें आला धांवोन ॥
कीं वारणें गांजितां पंचानन ॥ हांक फोडोनि धांविन्नला ॥५४॥
रोगें व्यापिला बहुवस ॥ तों वैद्य पाजिला सुधारस ॥
तैसें बिभीषण बोलतां रामास ॥ मिथ्या दुःख वितळलें ॥५५॥
बिभीषणवचन पौर्णिमा थोर ॥ कळायुक्त दिसे रामचंद्र ॥
उचंबळला कपिसमुद्र ॥ सुखभरतें दाटलें ॥५६॥
बिभीषणास म्हणे रघुनंदन ॥ तुझे उपकारा मी नव्हें उत्तीर्ण ॥
क्षणक्षणां आम्हांलागून ॥ सांभाळिसी प्राणसखया ॥५७॥
असो श्रीरामाचिये कर्णी ॥ बिभीषण सांगे तेचि क्षणीं ॥
इंद्रजितें निकुंभिलाभुवनीं ॥ कपटहोम आरंभिला ॥५८॥
होमधूमें कोंदलें निराळ ॥ होमाहुतीचें दाटले परिमळ ॥
अग्नींतून रथ तेजाळ ॥ अर्ध बाहेर निघाला ॥५९॥
अश्व सारथि धनुष्य बाण ॥ यांसह तो निघे स्यंदन ॥
कार्य सिद्धि जाहलिया पूर्ण ॥ मग रावणी नाटोपे ॥६०॥
तो चार वेळां येऊन ॥ रणीं गेला जय घेऊन ॥
आतां तो होम विध्वंसून ॥ आधीं सत्वर टाकावा ॥६१॥
विलंब करितांचि येथ ॥ तिकडे निघेल अवघा रथ ॥
रथ निघाल्या इंद्रजित ॥ कालत्रयीं नाटोपे ॥६२॥
द्वादश वर्षें निराहारी ॥ असेल जो ब्रह्मचारी ॥
तयाचेनि हातें शक्रारि ॥ मरेल ऐसें भविष्य असे ॥६३॥
ऐसें ऐकतां रघुनंदन ॥ सौमित्राकडे पाहे विलोकून ॥
धनुष्य चढवूनि गुण ॥ वेगें लक्ष्मण उभा ठाकला ॥६४॥
बंधूची बाल्यदशा देखोनि ॥ स्नेहभरित होय चापपाणि ॥
अनुजासी हृदयी कवळूनि ॥ मंत्र कर्णीं सांगतसे ॥६५॥
कोण्या मंत्रें कोण अस्त्र ॥ कोण्या समयीं प्रेरावें कोणते शस्त्र ॥
तें तें सर्वही राजीवनेत्र ॥ सौमित्रासी देता जाहला ॥६६॥
मस्तकीं ठेविला कृपाहस्त ॥ म्हणे सत्वर वधोनि इंद्रजित ॥
जयलाभ घेऊनि अद्‌भुत ॥ कल्याणरूप येइंजे ॥६७॥
सवें मारुती बिभीषण ॥ परम बुद्धिमंत कळाप्रवीण ॥
रामें धरूनि लक्ष्मण ॥ तयांचे हातीं दिधला ॥६८॥
नळ नीळ जांबुवंत अंगद ॥ गवय गवाक्ष ऋषभ मैंद ॥
पनस केसरी दधिमुख द्विविद ॥ वीर अगाध निघाले ॥६९॥
आणि असंख्य निघती वानरगण ॥ पुढें मार्ग दावी बिभीषण ॥
निकुंभिला गड परम कठिण ॥ लंकेहूनि अगाध ॥७०॥
अंगदस्कंधी लक्ष्मण ॥ जैसा गजेंद्रावरी सहस्रनयन ॥
पुढें कडे लागले कठिण ॥ मग बिभीषण बोलत ॥७१॥
म्हणे घ्या अवघे उड्डाण ॥ निकुंभिला दुर्ग ओलांडून ॥
शक्रजित करी हवन ॥ आधीं विध्वंसोनि टाका तें ॥७२॥
मग निराळपंथें ते वेळे ॥ निकुंभिलेंत प्रवेशले ॥
तो सैन्यदुर्ग सबळ बळें ॥ सात भोंवते रक्षिती ॥७३॥
वृषभ गवय हनुमंत ॥ घेऊनियां शिळा पर्वत ॥
जेथे हवन करी इंद्रजित ॥त्या विवरांत प्रवेशले ॥७४॥
तों सभोंवती भूतें रक्षिती ॥ तितुकीं झोडून पळवी मारुति ॥
तंव तो इंद्रजित पापमूर्ति ॥ वज्रासनीं बैसला ॥७५॥
रक्तोदकें स्नान करूनि ॥ रक्तवस्त्रें नेसला रावणी ॥
सप्त प्रेते पसरूनि ॥ त्यावरी आसन घातले ॥७६॥
पिंगट जटा मोकळ्या दिसती ॥ रक्तें थबथबां गळती ॥
नेत्र लावूनि आहुती ॥ टाकीतसे त्वरेनें ॥७७॥
ब्राह्मणांची शिरें बहुत ॥ त्यांचा जवळी पडिला पर्वत ॥
अस्तिमाळां गळां डोलत ॥ उरग मृत शिरीं वेष्टिले ॥७८॥
द्विजदंतांच्या लाह्या करूनि ॥ साजुक रक्त मांस घाली हवनीं ॥
रथ निघाला अग्नींतूनि ॥ तरणीहूनि तेजागळा ॥७९॥
प्राप्त होतां दिव्य निधान ॥ जैसें अभाग्यावरी पडे विघ्न ॥
तैसें हनुमंतें पर्वत टाकून ॥ होमकुंड विध्वंसिलें ॥८०॥
अग्नि चहूंकडे विखरत ॥ गेलें परतोनि आराध्यदैवत ॥
अग्नीनें गिळिला माघारीं रथ ॥ परम अनर्थ जाहला ॥८१॥
इंद्रजिताच्या पृष्ठीवरी ॥ ऋषभ देहधर्मातें करी ॥
यज्ञपात्रें फोडोनि झडकरी ॥ होमद्रव्यें उलंडीत ॥८२॥
गजर कानीं पडतां बहुत ॥ सावध जाहला शक्रजित ॥
देखोनियां तें विपरीत ॥ परम दुश्चित ते वेळे ॥८३॥
म्हणे दैवत क्षोभलें सबळ ॥ कैसी वैरियांनी साधिली वेळ ॥
माझें आयुष्यसिंधुजळ ॥ आजपासूनि आटलें ॥८४॥
वानर तेथें गेलें समस्त ॥ परम कोपला इंद्रजित ॥
वेगें आणूनि दिव्य रथ ॥ वरी आरूढें ते काळीं ॥८५॥
अद्‌भुत दळ घेऊनि ते वेळां ॥ निकुंभिलेबाहेर युद्धासी आला ॥
तों कपिभारेंसी उभा ठाकला ॥ सौमित्र देखिला शक्रजितें ॥८६॥
भगणांमाजी रोहिणीवर ॥ कीं किरणचक्रीं दिवाकर ॥
तैसा वानरांत सौमित्र वीर ॥ युद्धासी सिद्ध उभा असे ॥८७॥
जैसा कुळाचळांत मेरु अद्‌भुत ॥ तैसा रथारूढ दिसे इंद्रजित ॥
तों राक्षसदळ लोटलें समस्त ॥ वानरांवरी ते काळीं ॥८८॥
शिळा द्रुम पर्वत घेऊनी ॥ कपी धांवले तेक्षणीं ॥
राक्षसदळा होता आटणी ॥ प्रेतें अवनीं पडताती ॥८९॥
शूल असिलता शक्ति ॥ हीं आयुधें घेऊनि हातीं ॥
वानरांसी असुर खोंचिती ॥ कपी पडती विकळ तेणें ॥९०॥
तों नळ नीळ जांबुवंत ॥ प्रतापरुद्र अंजनीसुत ॥
यांचा मार अति अद्‌भुत ॥ आटले बहुत निशाचर ॥९१॥
अरिप्रताप देखोनि अत्यद्‌भुत ॥ परम क्रोधावला इंद्रजित ॥
होम विध्वंसिला त्या विषादें बहुत ॥ दांत खात करकरां ॥९२॥
लातेनें ताडितां उरग ॥ कीं खवळे शुंडा पिळितां मातंग ॥
कीं नासिकीं ताडितां सवेग ॥ महाव्याघ्र जेवीं खवळे ॥९३॥
कीं महातपस्वी अपमानिला ॥ कीं हुताशन घृतें शिंपिला ॥
तैसा इंद्रजित क्षोभला ॥ वेगें लोटिला रथ पुढें ॥९४॥
दृष्टीं देखतां वारण ॥ खवळे जैसा पंचानन ॥
तैसा क्षोभला लक्ष्मण ॥ जो भोगींद्र पूर्ण अवतरला ॥९५॥
विद्युत्प्राय चाप चढवून ॥ त्यावरी योजिला दिव्य बाण ॥
सिंहनादें गर्जोन ॥ रामानुज सरसावला ॥९६॥
मांडिलें तेव्हां वज्रठाण ॥ कौतुक पाहती सुरगण ॥
सौमित्रासी होवो कल्याण ॥ हेंच देव चिंतिती ॥९७॥
इंद्रजित म्हणे सौमित्रासी ॥ मजसी युद्ध करूं पाहसी ॥
जैसा हरिण शार्दूलासी ॥ झोंबी घ्यावया पातला ॥९८॥
सुपर्णावरी धांवे अळिका ॥ कीं मातंगावरी गोवत्स देखा ॥
कीं बळें धांवे पिपीलिका ॥ कनकाचळ उचलावया ॥९९॥
ऊर्णनाभी भावी मनीं ॥ स्वतंतूंनीं झांकीन मेदिनी ॥
वृश्चिक नांगी उभारूनी ॥ ताडीन म्हणे खदिरांगारा ॥१००॥
सूर्य जिकीन म्हणे खद्योत ॥ मक्षिका भूगोळ हालवूं इच्छीत ॥
वडवानळ धगधगित ॥ पतंग धांवे ग्रासावया ॥१॥
मजसी तैसा युद्धासी ॥ मानववंशी तूं आलासी ॥
माझे बाण केवीं साहसी ॥ समरांगणीं न कळे हें ॥२॥
यावरी बोले लक्ष्मण ॥ तुझें दृष्टीसी दिसतों लहान ॥
भस्में आच्छादिला हुताशन ॥ क्षणें कानन जाळील ॥३॥
दृष्टीसी न भरे केसरी ॥ परी क्षणें महागज विदारी ॥
वज्र धाकुटें परि करी ॥ चूर्ण सकळ नगांचें ॥४॥
खुजट दिसे वामन ॥ परी ढेंगेंत आटिलें त्रिभुवन ॥
घटोद्‌भवाची तनू सान ॥ परी सागर संपूर्ण प्राशिला ॥५॥
चिमणाच दिसे चंडांश ॥ परी मेदिनीभरी प्रकाशी ॥
तेवीं नरवीर राघवेश ॥ त्याचा दास मी असे ॥६॥
तुज आजि मी समरांगणीं ॥ खंड विखंड करीन बाणीं ॥
इंद्रादि देव पाहती गगनीं ॥ मनोरथ पुरवीन तयांचे ॥७॥
ऐकतां शोभला शक्रारि ॥ दिव्य बाण ते अवसरीं ॥
सोडी रामानुजावरी ॥ प्रळय चपळेसारिखा ॥८॥
जैसें सद्विवेकेंकरून ॥ ज्ञानी क्रोध टाकी खंडोन ॥
तैसा सौमित्रें तोडिला बाण ॥ निजशरेंकरूनियां ॥९॥
परम क्षोभला इंद्रजित ॥ बाणांचा पर्जन्य पाडित ॥
एके बाणेंच सुमित्रासुत ॥ पिष्ट करूनि टाकीतसे ॥११०॥
उगवतां वासरमणी ॥ भगणें लोपती जेवीं गगनीं ॥
कीं जलदजाल तत्क्षणीं ॥ प्रभंजन विध्वंसी ॥११॥
बोध प्रकटतां अंतरीं ॥ बहुत पातकें संहारी ॥
कीं आत्मज्ञान जेवी हरी ॥ संसारदुःखें अनेक ॥१२॥
तैसे इंद्रजिताचे शर पाहीं ॥ जो जनकाचा कनिष्ठ जावई ॥
बाण सर्व छेदूनि लवलाही ॥ पाडितसे एकीकडे ॥१३॥
सौमित्र सोडी एक शर ॥ त्यापासूनि बाण निघती अपार ॥
जैसा एकुलता एक पुत्र ॥ वाढे संतति बहु त्याची ॥१४॥
कीं तैलबिंदु जळीं पडतां ॥ पसरे चहूंकडे तत्वतां ॥
कीं सत्पात्रीं दान देतां ॥ कीर्ति प्रगटे सर्वत्र ॥१५॥
कुलवंतावरी उपकार करितां ॥ ते यश प्रगटें न सांगतां ॥
तैसा एक बाण सोडितां ॥ पसरती बहु चहूंकडे ॥१६॥
लक्षांचे लक्ष बाण ॥ सोडितसे सुमित्रानंदन ॥
इंद्रजित तितुके छेदून ॥ एकीकडे पाडी पैं ॥१७॥
इंद्रजित तुकावी मान ॥ म्हणे धन्य वीर लक्ष्मण ॥
रणधीर न ढळे ठाण ॥ योद्धा निपुण होय हा ॥१८॥
असो इंद्रजितें जपोनि मंत्र ॥ सोडिलें तेव्हां पर्जन्यास्त्र ॥
हस्तिशुंडेऐसी धार ॥ मेघ अपार वर्षती ॥१९॥
ऐसे देखोनि लक्ष्मण ॥ वातास्त्र जपोनि उडवी पर्जन्य ॥
जैसे वैराग्य प्रगटतां संपूर्ण ॥ संसारदुःखें वितुळती पैं ॥१२०॥
परी वात सुटला अद्‌भुत ॥ इंद्रजिताचें कटक उडत ॥
रावणीनें महापर्वत ॥ आड घातले वायूसी ॥२१॥
जैसें मायाजाळ अद्‌भुत ॥ तैसे आड दिसती पर्वत ॥
मग सौमित्रें वज्रें बहुत ॥ सोडोनि नग फोडिले ॥२२॥
करितां सारासार श्रवण ॥ काम क्रोध जाती वितळोन ॥
तैसे पर्वत फोडून ॥ पिष्टवत पैं केले ॥२३॥
मग तो सुलोचनावर ॥ सोडी वडवानळास्त्र ॥
त्यावरी दशरथी वीर ॥ सागरास्त्र सोडीतसे ॥२४॥
सागर अद्‌भुत देखोनी ॥ अगस्तिमंत्र जपे रावणी ॥
तत्काळ समुद्र आटोनी ॥ क्षणमात्रें टाकिला ॥२५॥
पापास्त्र सोडी इंद्रजित ॥ नाममंत्र जपे सुमित्रासुत ॥
माहेश्वर रावणी प्रेरित ॥ सौमित्र जपे ब्रह्मास्त्र ॥२६॥
ब्रह्मास्त्र श्रेष्ठ सर्वांत ॥ तेणें माहेश्वर ग्रासिलें समस्त ॥
जांबुवंत आणि हनुमंत ॥ तटस्थ कौतुक पाहती ॥२७॥
परम कोपा चढला रावणी ॥ पांच बाण काढी निवडोनी ॥
कीं पांचही सौदामिनी ॥ मेघाबाहेर निघाल्या ॥२८॥
ते अनिवार पांच बाण ॥ सोडिले आकर्णवरी ओढून ॥
अकस्मात येऊन ॥ सौमित्राचे हृदयीं भरले ॥२९॥
मेरु मांदार होती चूर्ण ॥ ऐसे ते कठोर पाच बाण ॥
भोगींद्रावतार लक्ष्मण ॥ तेणेंचि व्यथा साहिली ॥१३०॥
सवेंचि वीर लक्ष्मण ॥ सोडिता जाहला नव बाण ॥
इंद्रजिताचें कपाळ फोडून ॥ आंत संपूर्ण रूतले पैं ॥३१॥
इंद्रजित योद्धा दारुण ॥ बाल्यदशावेष्टित लक्ष्मण ॥
स्नेहें दाटोनि बिभीषण ॥ गदा झेलीत पुढें आला ॥३२॥
गदा फिरवूनि ते वेळीं ॥ इंद्रजिता वरी टाकिली ॥
येरे शर सोडोनि पाडिली ॥ एकीकडे आडवी ते ॥३३॥
मेघनादें सोडोनि पंचबाण ॥ हृदयीं खिळिला बिभीषण ॥
जांबुवंत ते दोखोन ॥ पुढें धांवे काळ जैसा ॥३४॥
पर्वतीं वज्र पडे अकस्मात ॥ तैसा रावणीवरी जांबुवंत ॥
हस्तचपेटें त्याचा रथ ॥ अश्वांसहित चूर्ण केला ॥३५॥
विरथ होऊन इंद्रजित ॥ भूमीवरी उभा युद्ध करित ॥
तों हनुमंतें विशाळ पर्वत ॥ रावणीवरी टाकिला ॥३६॥
नळ नीळ ऋषभ अंगद ॥ शरभ गवय गवाक्ष कुमुद ॥
केसरी पावकलोचन मैंद ॥ एकदांचि उठावले ॥३७॥
शिळा पर्वत ते अवसरीं ॥ टाकिती बळेंचि शक्रारीवरी ॥
देव पाहती अंबरीं ॥ कौतुक परम युद्धाचें ॥३८॥
इंद्रजित चतुर बहुत ॥ परम पराक्रमी रणपंडित ॥
तितुक्यांचे फोडी पर्वत ॥ बाणजाळ घालूनियां ॥३९॥
तंव इंद्रजित उडाला ॥ मेघाआड जाऊनि ते वेळां ॥
तेथोनियां वर्षों लागला ॥ बाणजाळ फार कपींवरी ॥१४०॥
सौमित्राचें ठाण गोजिरें ॥ मग काय केलें वायुकुमरें ॥
तळहातीं सौमित्र त्वरें ॥ उभा करूनि उडाला ॥४१॥
द्वादश गांवे इंद्रजित ॥ शतयोजनें उंच हनुमंत ॥
संग्राम केला अद्‌भुत ॥ उतरे इंद्रजित पृथ्वीवरी ॥४२॥
खालीं उतरला लक्ष्मण ॥ तों समस्त देव ऋषिगण ॥
सौमित्रासी चिंतिती कल्याण ॥ विजयी पूर्ण हो आजी ॥४३॥
पाठीसी वानरांचे भार ॥ आवेशें गर्जती वारंवार ॥
मांडलें परम घनचक्र ॥ अनिवार वीर दोघेही ॥४४॥
सिंहनादेकरून ॥ दोघेही गर्जविती गगन ॥
महाआवेशें संपूर्ण ॥ ब्रह्मांड ग्रासूं भाविती ॥४५॥
दोघांचे अंगीं रुतले शर ॥ जैसी पिच्छें पसरिती मयूर ॥
कीं पर्वतासी फुटले तृणांकुर ॥ तैसे वीर दिसती ॥४६॥
याउपरी सौमित्रवीर ॥ तूणीरांतूनि काढी दिव्य शर ॥
जैसा तृतीय नेत्रींचा वैश्वानर ॥ अकस्मात प्रगटला ॥४७॥
जैसा माध्यान्हींचा गभस्ति ॥ तैसीं बाणांचीं मुखें दिसती ॥
तयांची किरणें प्रकाशलीं क्षितीं ॥ न लक्षवे कोणातें ॥४८॥
रामनाममुद्रांकित ॥ देदीप्यमान बाण समर्थ ॥
सुमित्रासुताचे मनोरथ ॥ पूर्णकर्ता निर्धारें ॥४९॥
तो बाण धनुष्यावरी ॥ सौमित्रें योजिला झडकरी ॥
आकर्ण ओढोनि अंतरीं ॥ काय चिंतिता जाहला ॥१५०॥
म्हणे पूर्णब्रह्मसनातन ॥ मायातीत शुद्धचैतन्य ॥
तो सूर्यवंशी रघुनंदन ॥ जरी हें साच असेल ॥५१॥
मी स्त्री असोनि ब्रह्मचारी ॥ चतुर्दश वर्षें निराहारी ॥
कायावाचामनें अंतरीं ॥ रामउपासक जरी असें ॥५२॥
मंगळभगिनी जगन्माता ॥ सत्य असेल पतिव्रता ॥
रामदासत्व हनुमंता ॥ जरी साच घडलें असेल ॥५३॥
शिवकंठीचें हालाहल ॥ नामें शमलें असेल सकळ ॥
तरी या बाणें शिरकमळ ॥ इंद्रजिताचें खंडेल ॥५४॥
ऐसें चिंतोनी निज मनीं ॥ बाण सोडिला तत्क्षणीं ॥
शक्रारीचा कंठ लक्षोनी ॥ गगनमार्गे जातसे ॥५५॥
यावरी विंशतिनेत्रपुत्र ॥ बाण देखोनि परम तीव्र ॥
मग स्वयें निर्वाण शर ॥ योजूनि आकर्ण ओढिला ॥५६॥
तंव इतुक्यांत अकस्मात ॥ बाण पावला कृतांतवत ॥
तेणें कंठ आणि भुजा त्वरित ॥ छेदोनि नेलीं गगनमार्गे ॥५७॥
वक्र सुरीनें त्वरित ॥ कृषीवल कणसें छेदित ॥
तैसें शिर भुजेसहित ॥ बाणें नेलें ते काळी ॥५८॥
भुज उसळून अद्‌भुत ॥ लंकेवरी जाऊनि पडत ॥
शिर भूमंडळीं उतरत ॥ कंदुकवत ते काळीं ॥५९॥
तों ऋषभें धांवोनि सत्वर ॥ वरिच्यावरी झेलिलें शिर ॥
जाहला एकचि जयजयकार ॥ सुमनसंभार देव वर्षती ॥१६०॥
इंद्र संतोषला बहुत ॥ म्हणे आजि माझे भाग्य उदित ॥
दिशा पावलों यथार्थ ॥ सुमित्रासुत प्रसादें ॥६१॥
शक्राचा हर्ष ते काळीं ॥ न मायेचि नभमंडळीं ॥
दुंदुभींची घाई लागली ॥ ऋषिमंडळी आनंदत ॥६२॥
पुष्पवृष्टि वारंवार ॥ सौमित्रावरी करी देवेंद्र ॥
इंद्राचा उजळला मुखचंद्र ॥ निष्कलंक क्षयरहित ॥६३॥
इंद्रजित पडिला मेदिनीं ॥ दीनवदन पळे वाहिनी ॥
प्राण जातां तेचि क्षणी ॥ इंद्रियें जैसीं निस्तेज ॥६४॥
दीप गेलिया प्रभा हारपे ॥ कीं शशी मावळतां चांदणें लोपे ॥
कीं गायन राहतां संपें ॥ स्वर करणें सर्वही ॥६५॥
कीं वृक्ष उन्मळतां क्षिती ॥ अंडज नीडें सांडूनि पळती ॥
शक्रारि पडतां ते रीतीं ॥ सेनासमुदाय फुटला ॥६६॥
जय पावून संपूर्ण ॥ परतला वीर लक्ष्मण ॥
वारंवार बिभीषण ॥ स्तुति करी सौमित्राची ॥६७॥
मग हनुमंताचे स्कंधावरी ॥ सौमित्र बैसला ते अवसरीं ॥
तनु जर्जर शरप्रहारी ॥ जाहली असे तेधवां ॥६८॥
सुवेळागिरि लक्षून ॥ चालिले तेव्हां वानरगण ॥
समस्त सांगे बिभीषण ॥ आल्या पंथें चलावें ॥६९॥
इंद्रजिताचें विशाळ शिर ॥ झेलीत नेत ऋषभ वानर ॥
दृष्टीनें पाहील रघुवीर ॥ म्हणोनि संगें घेतलें ॥१७०॥
असो इकडे श्रीराम ॥ जो स्कंदतातमनविश्राम ॥
सौमित्राकारणें परम ॥ चिंताक्रांत जाहला ॥७१॥
सुग्रीवाप्रति रघुनंदन ॥ म्हणे निकुंभिलेसि गेला लक्ष्मण ॥
तेथें कैसे वर्तमान ॥ जाहलें असेल कळेना ॥७२॥
इंद्रजिताचे युद्ध कठिण ॥ आम्हांसी नागपाशीं बांधिलें जाण ॥
शरजाळीं सेना संपूर्ण ॥ खिळोनियां पाडिली ॥७३॥
योद्धा इंद्रजित विशेष ॥ बाळदशा सौमित्रास ॥
ऐसें बोलोनि अयोध्याधीश ॥ अश्रु नयनीं आणिले ॥७४॥
सुग्रीव म्हणे रघुपती ॥ आपण खेद न करावा चित्ती ॥
इंद्रजितासी वधोनि त्वरितगतीं ॥ आतां येईल सौमित्र ॥७५॥
ऐशी चिंता करितां अकस्मात ॥ तों वानर आले पुढें धांवत ॥
सांगती आला सुमित्रापुत्र ॥ इंद्रजिता वधोनियां ॥७६॥
परम आनंदला रघुवीर ॥ सामोरा धांवे मित्रकुमर ॥
तों समीप देखिला सौमित्र ॥ बाळसूर्य जयापरी ॥७७॥
हनुमंताचे स्कंधावरून ॥ खालीं उतरला लक्ष्मण ॥
सुग्रीव आणि बिभीषण ॥ हस्त धरूनि चालत ॥७८॥
हळू हळू चाले लक्ष्मण ॥ शर अंगीं रुतले तीक्ष्ण ॥
दृष्टीं देखोनि रघुनंदन ॥ केलें नमन साष्टांगीं ॥७९॥
मग उठोनि राजीवनेत्र ॥ प्रीतीनें हृदयीं धरी सौमित्र ॥
वृत्र वधितां सहस्रनेत्र ॥ गुरु जैसा आलिंगी ॥१८०॥
श्रीराम म्हणे सौमित्रातें ॥ तुवां वधोनि इंद्रजितातें ॥
ब्रह्मांड भरलें पुरुषार्थे ॥ पराक्रम करूनियां ॥८१॥
कोणासी नाटोपे रावणी ॥ तो त्वां वधिला समरांगणीं ॥
देवांसहित वज्रपाणि ॥ आनंदमय जाहला ॥८२॥
ऐसें बोलोनि रघुनाथ ॥ सौमित्र मस्तकी ठेवी हस्त ॥
श्रम हारपला समस्त ॥ आनंदभरित लक्ष्मण ॥८३॥
बिभीषण जांबुवंत ॥ समस्तांसी भेटला रघुनाथ ॥
शब्दरत्‍नें गौरवित ॥ धन्य पुरुषार्थ तुमचा पै ॥८४॥
पुढें ठेऊन् शत्रूचें शिर ॥ ऋषभें केला नमस्कार ॥
मग म्हणे सीतामनोहर ॥ धन्य धन्य ऋषभा तूं ॥८५॥
आरक्त पुष्पें पूजा करून ॥ हें शिर ठेवावें जतन ॥
मागों येईल त्यालागून ॥ द्यावें लागेल शिर हे ॥८६॥
सुषेणासी म्हणे रघुवीर ॥ तूं वैद्य आणि प्रतापशूर ॥
तरी सौमित्रासी करावा उपचार ॥ देह जर्जर बाणीं जाहला ॥८७॥
मग सुषेणें औषधी आणून ॥ दिव्यदेही केला लक्ष्मण ॥
असो यावरी बिभीषण ॥ वर्तमान सर्व सांगे ॥८८॥
कैसा जाहला संग्राम ॥ वीरद्वयांचा पराक्रम ॥
ते ऐकोनि मेघश्यम ॥ आश्चर्य परम करितसे ॥८९॥
म्हणे धन्य धन्य इंद्रजित वीर ॥ पुरुषार्षासी नाहीं पार ॥
दीन करून देव समग्र ॥ बंदी जेणें घातले ॥१९०॥
याउपरी सुलोचना ॥ शिर मागों येईल राजीवनयना ॥
ते सुरस कथा ऐकतां श्रवणां ॥ सौख्य होईल अतयंत ॥९१॥
रामविजयग्रंथ प्रचंड ॥ त्यांत रसभरित युद्धकांड ॥
श्रवणें पुरे सर्व कोड ॥ न लगे चाड आणिकांची ॥९२॥
ब्रह्मानंदा श्रीरामा ॥ जगद्वंद्या पूर्णब्रह्मा ॥
श्रीधरवरदा अनामा ॥ पूर्णकामा अभंगा ॥९३॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनत्रिंशतितमोऽध्याय गोड हा ॥१९४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय तिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जो पद्मिनीवल्लभकुलभुषण ॥ जो पद्मजातजनक पद्मलोजन ॥
विषकंठहृदय दशकंठदलन ॥ सच्चिदानंदतनु जो ॥१॥
जो रघुकुलकमलदिवाकर ॥ अजित भ्रांतिविपिनवैश्वानर ॥
जो भक्तहृदयाब्जभ्रमर ॥ लीलावतार धरी जो ॥२॥
जो षड्गुणैश्वर्यसंपन्न ॥ यश श्री कीर्ति विज्ञान ॥
जो औदार्यवैराग्यपरिपूर्ण ॥ सत्यज्ञान शाश्वत जो ॥३॥
जो कां निर्विकल्प अनंत ॥ हेतुदृष्टांत विवर्जित ॥
तो सुवेळाचळीं रघुनाथ ॥ राक्षसवधार्थ पातला ॥४॥
जो भवगजविदारक मृगनायक ॥ मोक्षफळाचा परिपाक ॥
तो राम ताटिकांतक ॥ सुरपाळ जगद्‌गुरु ॥५॥
गतकथाध्यायीं निरूपण ॥ गुणसिंधूचा बंधु लक्ष्मण ॥
इंद्रजिताचा वध करून ॥ शिर घेऊन पैं गेला ॥६॥
शरीराचे प्राक्तन विचित्र ॥ ऋषभें सुवेळेसी नेलें शिर ॥
धड रणीं भुजा सत्वर ॥ लंकेवरी पडियेली ॥७॥
भुजा आपटोनि मागुती उडत ॥ जैसा कंदुक आदळोनि उसळत ॥
तैसा भुजदंड अकस्मात ॥ निकुंभिलेंत पडियेला ॥८॥
सुलोचनेचे आंगणीं ॥ भुजदंड पडिला ते क्षणीं ॥
तों रावणस्नुषा अंतरसदनीं ॥ सुखरूप बैसली असे ॥९॥
ते दशशतवदनाची कुमरी ॥ कीं लावण्यसागरींची लहरी ॥
ज्येष्ठ स्नुषा निर्धारीं ॥ राघवारीची ती होय ॥१०॥
जे नगारिशत्रूची राणी ॥ यामिनाचरांची स्वामिणी ॥
जिचें स्वरूपलावण्य देखोनी ॥ सुरांगना होती लज्जित ॥११॥
देवगणगंधर्वराजकुमरी ॥ सेवा करिती अहोरात्री ॥
सहस्रनेत्राची अंतुरी ॥ न पवे सरी जियेची ॥१२॥
आंगींचा सुवास अद्‌भुत ॥ धांवे एक कोशपर्यंत ॥
विषकंठरिपूची कांता यथार्थ ॥ तुळितां न पुरे इयेसीं ॥१३॥
नैषधजाया परम सुंदर ॥ वर्णिती काव्यकर्ते चतुर ॥
परी शेषकन्येसी साचार ॥ उपमा द्यावया पुरेना ॥१४॥
आंगींच्या प्रभेने भूषणें ॥ झळकती अत्यंत दिव्य रत्‍नें ॥
किन्नरकन्या गायनें ॥ मधुरस्वरें जवळ करिती ॥१५॥
एक शृंगार सांवरिती ॥ एक चामरें घेऊनि वारिती ॥
एक उपभोग आणोनि देती ॥ संतोषविती नानाशब्दें ॥१६॥
सुलोचनेचे आनंदु ॥ तों अमृतीं पडे विषबिंदु ॥
तैसा तो भुज सुबुद्धु ॥ अंगणीं येऊन पडियेला ॥१७॥
भुज पडतांचि ये धरणी ॥ दणाणिली तये क्षणीं ॥
दूती कित्येक धांवूनी ॥ पहावया बाहेर आल्या ॥१८॥
ते पाचबंध अंगणांत ॥ वीरपाणि पडिला अद्‌भुत ॥
देखोनि दासी भयभीत ॥ आल्या शंकित सांगावया ॥१९॥
म्हणती नवल वर्तलें वो साजणी ॥ महावीराचा तुटोनि पाणी ॥
येऊन पडिलासे अंगणीं ॥ निराळमार्गें अकस्मात ॥२०॥
ऐकोनि दासींचे वचन ॥ दचकलें सुलोचनेंचें मन ॥
रत्‍नपादुका त्वरेंकरून ॥ अंध्रियुगुळीं लेइल्या ॥२१॥
तडित्प्राय झळके अंबर ॥ आंगणांत आली सत्वर ॥
उतरला तेव्हां मुखचंद्र ॥ विव्हळनेत्र जाहले ॥२२॥
अंग जाहलेसें विकळ ॥ पुढें न घालवेचि पाऊल ॥
वदनींचें काढोनि तांबूल ॥ एकीकडे भिरकाविलें ॥२३॥
सखियांसी म्हणे सुलोचना ॥ प्राणपति आज गेले रणा ॥
सीतेलागीं अयोध्याराणा ॥ सुवेळाचळीं बैसला ॥२४॥
ऐसें बोलतां शेषनंदिनी ॥ भुजेसमीप येतां ते क्षणीं ॥
तंव ते शक्रजिताचा पाणी ॥ पतिव्रतेनें ओळखिला ॥२५॥
पंचांगुळीं मुद्रिका मंडित ॥ वीरकंकणें दिव्य विराजित ॥
दंडीं कीर्तिमुखें झळकत ॥ चपळेहूनि विशेष पै ॥२६॥
आजि माझें जहाज बुडालें ॥ म्हणोनि वदन हातीं पिटिलें ॥
परम आंकंत ते वेळे ॥ वाटे बुडाले ब्रह्मांड ॥२७॥
सुमनकळिकेवरी सौदामिनी ॥ पडतां उरी न उरे ते क्षणीं ॥
तैसी निस्तेज होउनी ॥ भोगींद्रनंदिनी पडियेली ॥२८॥
लोभियाचे गेलें धन ॥ कीं जळचरें जीवनावांचून ॥
तैसी पतिवियोगेंकरून ॥ सुलोचना तळमळे ॥२९॥
म्हणे विपरीत काळाची गती ॥ मृगाजळी बुडाला अगस्ती ॥
दीपतेजें रोहिणीपती ॥ आहाळोनि खालीं पडियेला ॥३०॥
तमकूपीं बुडाला तरणी ॥ पाडसें सिंह धरिला वनी ॥
पिपीलिकेनें मुखी घालोनि ॥ मेरु कैसा रगडिला ॥३१॥
अळिकेनें गिळिला सुपर्ण ॥ मशकीं ग्रासिला महाअग्न ॥
भूतांनीं काळ धरून ॥ समरांगणीं मारिला ॥३२॥
मग सुलोचनेसी उचलोनी ॥ सखिया बैसविती सांवरूनी ॥
पतीची भुजा हृदयीं धरूनी ॥ आक्रंदत सुलोचना ॥३३॥
मग भुजेप्रति बोले वचन ॥ कैसें प्राणपतीस आलें मरण ॥
तरी तें सर्व वर्तमान ॥ लिहून मज विदित करीं ॥३४॥
पतिचरणीं माझें मन ॥ जरी असेल रात्रंदिन ॥
तरीच पत्रीं लिहून ॥ वर्तमान दृश्य करीं ॥३५॥
हाटकरसपात्र पुढें ठेविलें ॥ भूर्जपत्र उकलोनि पसरिलें ॥
लेखनी हाती देतां शीघ्रकाळें ॥ भुजेनें लिहिलें ते समयीं ॥३६॥
नवल अद्‌भुत वर्तलें ॥ सर्व वर्तमान पत्रीं लिहिलें ॥
सुलोचनेनें पत्र घेतलें ॥ मस्तकीं वंदिलें ते वेळे ॥३७॥
नयनीं लोटले अश्रुपात ॥ शेषकन्या पत्र वाचित ॥
भोंवत्या ललना समस्त ॥ ऐकती निवांत ते काळीं ॥३८॥
ऐकें दशशतमुखकन्यके ॥ सुकुमारे चंपककलिके ॥
मम मानससरोवरमरालिके ॥ प्राणवल्लभे सुलोचने ॥३९॥
जयआशा अंतरीं धरून ॥ गूढस्थळीं करितां हवन ॥
अग्नींतून दिव्य स्यंदन ॥ निघाला पूर्ण राजसे ॥४०॥
फळप्राप्तीचा समय लक्षून ॥ शत्रू आलें तेथें धांवून ॥
चंउ शिळा वरी घालोन ॥ आराध्यदैवत क्षोभविलें ॥४१॥
पर्वत चढला संपूर्ण ॥ शिखरीहून दिधला ढकलून ॥
कीं नदी अवघी उतरून ॥ तीरासमीप बुडाला ॥४२॥
प्रगटतां वैराग्यज्ञान ॥ वरी विषयघाला पडे येऊन ॥
कीं प्राप्त होतां निधान ॥ विवसी येऊनि वरी पडे ॥४३॥
कष्टें करितां वेदाध्ययन ॥ वरी धाड घाली अभिमान ॥
सूर्य सर्व अंबर क्रमून ॥ राहुमुखीं सांपडें जेवीं ॥४४॥
वल्लभे तैसेंच येथे जाहलें ॥ शत्रूंनीं शेवटी वैर साधिलें ॥
प्रारब्धबळ उणें पडलें ॥ होणार न टळे कल्पांतीं ॥४५॥
पुढें दारुण संग्राम मांडिला ॥ परी जय आम्हांस पारखा जाहला ॥
जाऊनि सौमित्रासी मिळाला ॥ शत्रूचा वाढला पराक्रम ॥४६॥
सौमित्र परम निधडा वीर ॥ धनुर्विद्या त्याची अपार ॥
देखोनि उचित दिधलें शिर ॥ राम मित्र जोडिला ॥४७॥
देहआशा जीवीं धरून ॥ भयें शरण गेला बिभीषण ॥
म्यां देहत्रय निरसून ॥ विदेहजामात मित्र केला ॥४८॥
सौमित्र तपस्वी पूर्ण पवित्र ॥ बहुत दिवस निराहार ॥
उतरूनियां सिंधु समग्र ॥ मागावया शिर पातला ॥४९॥
मग मी कृपणता टाकून ॥ निजशिराचें केले दान ॥
तेणें रामचरणीं नेऊन ॥ शिर माझे समर्पिलें ॥५०॥
शरीर उभें आहे रणीं ॥ शिर पाहूं गेलें चापपाणी ॥
तुज मूळ धाडिला पाणी ॥ वेगेंकरून येईं कां ॥५१॥
मायानदी उल्लंघूनि दुर्घट ॥ पाहें पैलतीरीं तुझी वाट ॥
प्राणवल्लभे येऊनि भेट ॥ सत्वर आतां मजलागीं ॥५२॥
दुःखरूप परम संसार ॥ रामचरणीं सुखी अपार ॥
हें जाणोनि धाडिला कर ॥ येई सत्वर प्राणप्रिये ॥५३॥
असो ते धराधरकुमरी ॥ पत्र वाचूनि ते अवसरीं ॥
शरीर टाकूनि धरित्रीवरी ॥ शोक करी अपार ॥५४॥
आजि बळाचा समुद्र आटला ॥ कीं धैर्याचा मेरु खचला ॥
प्रतापवृक्ष उन्मळला ॥ समरभूमींसीं अकस्मात ॥५५॥
इंद्रजितसूर्याच्या किरणें ॥ मावळती शत्रुतारागणें ॥
तो आजि सौमित्राहूनें ॥ खग्रास केला समूळीं ॥५६॥
रणसरोवरी शत्रकमळें ॥ तूं वारणें छेदिलीं निजबळें ॥
सौमित्रासिंहें कुंजरा बळें ॥ विदारून नेलें शिरमुक्त ॥५७॥
ऐरावतीसमवेत पाकशासन ॥ समरीं पाडिला उलथोन ॥
तो आजि मानव लक्ष्मण ॥ तेणें रणीं मारिलासे ॥५८॥
माझें सौभाग्यभांडार ॥ त्यावरी पडिला तस्कर ॥
माझिया भाग्याचा समुद्र ॥ सौमित्रअगस्तीनें प्राशिला ॥५९॥
इंद्रजित माझा रोहिणीवर ॥ सौमित्रप्रतापराहू थोर ॥
कलांसहित न दिसे चंद्र ॥ पुनः मागुता सहसाही ॥६०॥
वृत्रारिशत्रूची अंतुरी ॥ नानाप्रकारें विलाप करी ॥
पशुपक्षी ते अवसरीं ॥ रुदती करुणा ऐकोनियां ॥६१॥
सखिया म्हणती सुलोचने ॥ आतां किमर्थ शोक करणें ॥
आपुलें परत्रसाधन देखणें ॥ संसारमाया त्यजोनियां ॥६२॥
जें जें दिसे तें तें नाशिवंत ॥ मुळीं मिथ्या अहिकुंडलवत ॥
पदीं नेपुरें बांधोनि नाचत ॥ मीन भूमीसी मिथ्या पैं ॥६३॥
उदिमा गेला वंध्यासुत ॥ रात्रीं मृगजळीं मत्स्य धरीत ॥
गंधर्वनगर वाटत ॥ मिथ्या समस्त तैसें हें ॥६४॥
असो नगारिशत्रूची गृहिणी ॥ प्रवेशोनि आत्मसदनीं ॥
नानासंपत्ति देखोनी ॥ मनीं विटे तत्काळ ॥६५॥
परापवादें विटती सज्जन ॥ कीं चिळसी ये देखतां वमन ॥
कीं सुंदर ललना देखोन ॥ विटे जैसा विरक्त ॥६६॥
तैसी नानासंपदा देखतां ॥ विटली शक्रारीचा कांता ॥
शुकपिकादि द्विजां समस्तां ॥ मुक्त केलें स्वहस्तें ॥६७॥
सदनासी नमन करूनी ॥ शिबिकेंत भ्रतारहस्त घालोनी ॥
चपळ अश्विनीवरी बैसोनी ॥ लंकेसी तेव्हां चालिली ॥६८॥
तों पुढे दूत येऊन ॥ सांगती सर्व वर्तमान ॥
मग लघु कपाटें उघडून ॥ सुलोचना प्रवेशली ॥६९॥
अस्ता गेला वासरमणी ॥ प्रवर्तली घोर रजनी ॥
रजनीचर ते क्षणीं ॥ नगददुर्गींचे गजबजिले ॥७०॥
सभेत बैसला लंकानाथ ॥ तों स्नुषा देखे अकस्मात ॥
गजबजिला मयजानाथ ॥ चिन्ह विपरीत देखोनियां ॥७१॥
सुलोचना सद्रद होऊनी ॥ मस्तक ठेवी श्वशुचरणीं ॥
रावण म्ण्हे वो साजणी ॥ माये किमर्थ आलीस ॥७२॥
तों भुजेसहित पत्र ॥ श्वशुरापुढें ठेविलें सत्वर ॥
म्हणे स्वर्गा गेले भ्रतार ॥ त्यां समागमें जाईन मी ॥७३॥
ऐसें ऐकतांचि रावण ॥ घेत वक्षःस्थळ बडवून ॥
खालीं पडे सिंहासनावरून ॥ महाद्रुम उन्मळे जेवीं ॥७४॥
मृत्तिका घेऊनि लंकानाथ ॥ दाहीं मुखीं तेव्हां घालित ॥
वर्तला एकचि आकांत ॥ नाहीं अंत महाशब्दा ॥७५॥
गजर ऐकोनि तये वेळीं ॥ मयकन्यां तेथें पातली ॥
वार्ता पुत्राची ऐकली ॥ मूर्च्छित पडली धरणीये ॥७६॥
ऐशीं सहस्र राजअंगना ॥ आल्या महामंडपस्थाना ॥
शोकार्णवीं पडली मयकन्या ॥ सर्वही तियेसी सांवरिती ॥७७॥
मंदोदरी म्हणे स्नेहाळा ॥ मेघनादा माझिया बाळा ॥
मज न पुसतां रणमंडळा ॥ सखया कैसा गेलासी ॥७८॥
त्रिभुवन शोधितां समग्र ॥ न देखो तुजऐसा धनुर्धर ॥
बंदीं घातले समस्त सुरवर ॥ शत्रु समग्र खिळिले शरीं ॥७९॥
पूर्वीं मी व्रते तपें आचरलें ॥ पूर्ण न होता मध्यें सांडिलें ॥
म्हणूनि तुजऐसें निधान गेलें ॥ आड ठाकलें पूर्वकर्म ॥८०॥
कीं म्यां केला पंक्तिभेद ॥ संतांस बोलिल्यें दोषशब्द ॥
कीं शिव आणि मुकुंद ॥ वेगळे दोघे भाविले ॥८१॥
हरिकीर्तन रंग मोडिला ॥ क्षुधार्थी पात्रींचा उठविला ॥
कीं परद्रव्याचा अभिलाष केला ॥ किंवा घडला गुरुद्रोह ॥८२॥
कीं परलाभाची केली हानी ॥ कीं दोष ठेविला गंगेलागुनी ॥
की कुरंगिणी पाडसा वनीं ॥ बिघड पूर्वीं म्यां केला ॥८३॥
कीं भिक्षा न घालितां साचार ॥ द्वारींचा दवडिला यतीश्वर ॥
म्हणोनि इंद्रजिताऐसा पुत्र ॥ गेला निश्चित त्या दोषें ॥८४॥
असो काद्रवेयकुलभूषणकुमारी ॥ दशकंठजाया तिसी हृदयीं धरी ॥
दोघीं शोक करिती तेणें धरित्री ॥ कंपित झाली तेधवां ॥८५॥
मग शेषकन्या बोले वचन ॥ मज द्यावें आजि शिर आणून ॥
वाट पाहतां पतीचे नयन ॥ शिणले जाईन सांगातीं ॥८६॥
ऐसें बोलतां सुलोचना ॥ परम क्रोध चढला दशवदना ॥
घाव घातला निशाणा ॥ म्हणे सत्वर सेनां सिद्ध करा ॥८७॥
आजि संग्राम करीन निर्वाण ॥ रामसौमित्रांचीं शिरें आणीन ॥
अथवा पुत्रपंथ लक्षून ॥ मी जाईन आतांचि ॥८८॥
दशमुख कोपला देखोनी ॥ मयजा सांगे सुनेच्या कर्णीं ॥
म्हणे तूंचि तेथे जाऊनी ॥ शिर मागून घेईं कां ॥८९॥
मंगळजननीकुमरीवर ॥ तयापासीं तूं मागें शिर ॥
तो भक्तवत्सल परम उदार ॥ दयासिंधु दीनबंधु ॥९०॥
जो या चराचराचें जीवन ॥ जनकजा वेगळी करून ॥
सकळ स्त्रिया मातेसमान ॥ एकबाणी एकवचनी ॥९१॥
दुःखामाजी हे सुख थोर ॥ दृष्टीं पाहें वैदेहीवर ॥
इतुकेन तुझा सार्थक संसार ॥ इह -परत्र सर्वही ॥९२॥
पुण्यपरायण श्रीरामभक्त ॥ सुग्रीव जांबुवंत हनुमंत ॥
न्यायसिंधु बिभीषण तेथ ॥ पाठिराखे सर्वस्वें ॥९३॥
ऐसें बोलतां मयकन्या ॥ आलें सुलोचनेचिया मना ॥
मग श्वशुरासी मागे आज्ञा ॥ सुवेळाचळीं जावया ॥९४॥
दशद्वयनेत्र बोले ॥ तुज जरी त्यांही ठेवून घेतलें ॥
कैसे करावें तये वेळे ॥ सांग वहिलें आम्हांतें ॥९५॥
उरग बैसला धुसधुसित ॥ तया मुखीं केवीं घालिजे हात ॥
यावरी शेषकन्या बोलत ॥ दशकंठासी तें ऐका ॥९६॥
परसतीचा अभिलाष समूळ ॥ करी ऐसा कोण चांडाळ ॥
त्याचा वंश भस्म होईल ॥ विपरीत कर्म आचरतां ॥९७॥
पतिव्रतेचा अभिलाष धरून ॥ कोण पावला जय कल्याण ॥
रावण बोले अधोवदन ॥ तरी अवश्य जाइंजे ॥९८॥
तुजसीं विपरीत करितां जाण ॥ शत्रु अवघे भस्म करीन ॥
शेषतनया खरें म्हणून ॥ तत्काळ तेव्हां निघाली ॥९९॥
बृहस्पतीऐसे विचक्षण ॥ घेतले शिष्ट आणि बंदीजन ॥
सहस्रार्ध दासी घेऊन ॥ अश्विनीवरी आरूढली ॥१००॥
संसारमाया टाकून ॥ संत स्वरूपीं होती लीन ॥
तैसी लंका उपेक्षून ॥ चालिली शरण रामचंद्रा ॥१॥
परम वेगें ते वेळीं ॥ आली श्रीरामसभेजवळी ॥
कृपाब्धीस भेटों आली ॥ पुण्यगंगा सुलोचना ॥२॥
कीं संतांचिया गृहाप्रती ॥ विश्रांतीस येई शांती ॥
तैसा शेषकन्या झाली येती ॥ सीतापति लक्षूनियां ॥३॥
कनकाद्रीभोंवते तरुवर ॥ तैसे राघवावेष्टित वानर ॥
कोटिकंदर्पलावण्यसुंदर ॥ अवनिजावर देखिला ॥४॥
भोंवते कपी यंत्राकार ॥ उभे असती जोडूनि कर ॥
मध्यें रघुनाथपीठ पवित्र ॥ विराजमान घवघवित ॥५॥
अवनीखालीं उतरूनि जाणा ॥ मनीं आठवी कैलासराणा ॥
हंसगती चाले सुलोचना ॥ शेषकन्या चतुर जे ॥६॥
एक धांवोनि वानर येती ॥ हर्षे श्रीरामासी सांगती ॥
रावणें पाठविली सीता सती ॥ भयभीत होऊनियां ॥७॥
मग बोले चापपाणी ॥ रावण पडिला नाही जों रणीं ॥
तोंवरी जनकनंदिनी ॥ दृष्टी न पडे तुमच्या पैं ॥८॥
शेषकुमरी जवळी देखोन ॥ बिभीषणाकडे पाहे रघुनंदन ॥
तों तेणें आंसुवे भरलें नयन ॥ सद्‌गद कंठ जाहला ॥९॥
म्हणे जगद्वंद्या राजीवनेत्रा ॥ ही शक्रजितललना परम पवित्रा ॥
इचें नाम घेतां विषकंठमित्रा ॥ सर्व दोष हरतील ॥११०॥
कर्मगति परम गहन ॥ जिचे अंगुष्ठीं न पडे सूर्यकिरण ॥
शेषकन्या सुकुमार पूर्ण ॥ आली धांवून शिरालागीं ॥११॥
तों सुलोचनेनें जवळ येऊन ॥ विलोकून श्रीरामध्यान ॥
जयजयकारें लोटांगण ॥ राघवाचरणीं घातलें ॥१२॥
श्रीरामचरणकमळावरी ॥ शेषकन्या जाहली भ्रमरी ॥
ज्याचे चरणजरें निर्धारीं ॥ पद्मजाततनया उद्धरली ॥१३॥
दरिद्रियास सांपडे धन ॥ कीं जन्मांधासी आले नयन ॥
कीं जलद ओळतां देखोन ॥ मयूर जैसा आनंदे ॥१४॥
कीं पूरीं वाहोन जातसे ॥ त्यास प्राणसखा लावी कांसे ॥
कीं योगी पावे वृत्तिदशे ॥ निजमन जिंकोनियां ॥१५॥
तैसा देखोन श्रीरामचंद्र ॥ उल्हासे सुलोचनाचित्तचकोर ॥
कीं रघुनाथ होय दिनकर ॥ कमळिणी ते सुलोचना ॥१६॥
संसारतापें तापोनी ॥ दृढ जडली श्रीरामचरणीं ॥
तेथोनी उठावयासी मनीं ॥ आळस येतसे सुलोचने ॥१७॥
आतां हे सुख सांडोनी ॥ पुढती काय पहावें नयनीं ॥
सुलोचना मस्तक म्हणोनी ॥ पायांवरूनि उचलीना ॥१८॥
जैसा सुधारस गाळी इंदु ॥ तैसा बोले कृपासिंधु ॥
जो जगदीश दीनबंधु ॥ लाविला वेधु त्रिनेत्रासी ॥१९॥
म्हणे माते उठीं वो झडकरी ॥ परम श्रमलीस संसारीं ॥
आतां सुखीं राहें परत्रीं ॥ अक्षय सुख भोगीं तूं ॥१२०॥
ऐसें ऐकोनि झडकरी ॥ उभी ठाकली शेषकुमरी ॥
पाणिद्वय जोडूनि ते अवसरीं ॥ स्तवन करी सद्‌भावें ॥२१॥
म्हणे जयजय रामा विषकंठमित्रा ॥ रघूत्तमा राजीवनेत्रा ॥
जलदवर्णा चारुगात्रा ॥ मित्रकुळमुगुटमणे ॥२२॥
जगद्वंद्या जगन्नायका ॥ जनकजापति जगद्रक्षका ॥
जन्ममरणभयमोचका ॥ जनकजामाता जगद्‌गुरु ॥२३॥
जामदग्न्यजिता जलजनयना ॥ जगदीश्वरा जलदवर्णा ॥
जगद्यापका दुःखहरणा ॥ जन्मजरारहित तूं ॥२४॥
पुराणपुरुषा रघुनंदना ॥ भक्तवत्सला जगन्मोहना ॥
मायाचक्रचालका निरंजना ॥ निष्कलंका निर्गुण तूं ॥२५॥
आनंदअयोध्यापुरविहारा ॥ वेदवंद्या वेदसारा ॥
परम उदारा रघुवीरा ॥ अहल्योद्धारा मखपाळका ॥२६॥
जयजय रामा विश्वपाळणा ॥ विश्वव्यापका विश्वकरणा ॥
विश्वचाळका जगज्जीवना ॥ विश्वरक्षणा विश्वेशा ॥२७॥
विबुधललाटपटलेखना ॥ सनकसनंदनमनरंजना ॥
हे रघुवीर दानवदलना ॥ भवभंजना भवहृदया ॥२८॥
मंगलरूपा मंगलकारका ॥ जय मंगलजननी उद्धारका ॥
मंगलभगिनीप्राणनायका ॥ मंगलसहिता मंगलधामा ॥२९॥
कमलोद्‌भवजनका कमलनयना ॥ कमलानायका कमलशयना ॥
कमलनाभा कमलवदना ॥ कमलसदना कमलप्रिया ॥१३०॥
नमो भववारणपंचानना ॥ नमो पापरण्यकुठारतीक्ष्णा ॥
हे श्रीरामा त्रिविधतापशमना ॥ अनंतशयना अनंता ॥३१॥
तुज स्तवावया चापपाणी ॥ न चले सहस्रवदनाची वाणी ॥
नेति नेति म्हणूनी ॥ आगम जेथें तटस्थ ॥३२॥
तेथें एकजिव्हेचे स्तवन ॥ मांडेल माझें कोठोन ॥
जैसें भागीरथीस मज्जन ॥ थिल्लरोंदके मांडिलें ॥३३॥
पितळेचें पुष्प नेऊन ॥ केलें कनकाद्रीचें पूजन ॥
कीं जलार्णवासी अर्ध्यदान ॥ कूपोदके करावें ॥३४॥
अर्कास वाहिलें अर्कीसुमन ॥ मलयानिलासी अंचलपवन ॥
किंवा क्षीराब्धीपुढें नेऊन ॥ तक्र जैसे समर्पिलें ॥३५॥
केवी होय धरेचे वजन ॥ स्तंभ कैंचा टेंकावया गगन ॥
सप्तसमुद्रींचें जीवन ॥ टिटवीस केवीं मोजवे ॥३६॥
सकळप्रकाशनिशाकर ॥ त्यास दशी वाहिली अणुमात्र ॥
कीं धत्तूरपुष्पीं उमावर ॥ दरिद्रियानें पूजिला ॥३७॥
तुझें देखतांचि चरण ॥ तुटलें देहत्रयबंधन ॥
मन होऊन ठेलें उन्मन ॥ जन्ममरण तुटलें असे ॥३८॥
घागरीं आणि रांजणी ॥ एकचि बिंबला वासरमणी ॥
तैसा स्त्रीपुरुष अभिधानी ॥ चापपाणि व्यापक तूं ॥३९॥
तरी या स्त्रीदेहाची आकृती ॥ शक्रजिताची अंगना म्हणती ॥
पतिशिरासवें रघुपती ॥ अग्नीमाजीं घालिजे ॥१४०॥
तूं अयोध्याधीश उदारा ॥ अनाथ याचक मी मार्ग शिरा ॥
मी चातक तूं जलधरा ॥ कृपानिधी वर्षें कां ॥४१॥
जेव्हां उदया पावे गभस्ति ॥ तेव्हां चक्रवाकें मिळती ॥
तैसेंच आतां करी रघुपती ॥ मित्रुळप्रकाशका ॥४२॥
क्षीर आणि जळ ॥ वेगळें काढिती मराळ ॥
तैसा श्रीराम तमालनील ॥ भवपुरींहूनि काढीं कां ॥४३॥
पतीचें ऐकिलें वर्तमान ॥ तेव्हांच गेले माझे पंचप्राण ॥
परी शिराचें निमित्त करून ॥ तुझे चरण पाहूं आल्ये ॥४४॥
तूं चित्तपरीक्षक रघुनाथ ॥ जाणसी सर्वांचे मनोगत ॥
ऐसें सुलोचना म्हणत ॥ जगन्नायक तटस्थ जाहला ॥४५॥
म्हणे धन्य धन्य सहस्रवदन ॥ ऐसें उदरीं जन्मलें रत्‍न ॥
कीं भोगींद्राचें तप पूर्ण ॥ कन्यारूपें प्रगटलें ॥४६॥
सुलोचनेचें चातुर्य देखोन ॥ कपी सकळ तुकाविती मान ॥
श्रीरामासी म्हणे मित्रनंदन ॥ ईतें शिर देऊनि बोळवा ॥४७॥
जांबुवंत म्हणे हे पुण्यसरिता ॥ अंगद म्हणे धन्य पतिव्रता ॥
मारुति म्हणे इचें नाम घेतां ॥ पाप नुरें सहसाही ॥४८॥
सायुज्यता मुक्तिसमवेत ॥ इयेसी शिर द्यावें जी त्वरित ॥
असो यावरी जनकजामात ॥ पुसे दशकंठस्नुषेतें ॥४९॥
आम्हीं येथें आणिलें शिर ॥ तुज केवीं कळला समाचार ॥
येरी म्हणे पतीच्या करें ॥ पत्र लिहून दिधले ॥१५०॥
भूजपत्र दाविलें त्वरित ॥ आश्चर्य करी कौसल्यासुत ॥
तों वानर म्हणती समस्त ॥ आम्हांसी सत्य न वाटे ॥५१॥
निर्जीव हस्ते लिहिले पत्र ॥ तरीच आम्ही मानूं साचार ॥
जरी हें हांसवील शिर ॥ आपुल्या पतीचें ये काळी ॥५२॥
राम म्हणे इचा महिमा थोर ॥ काय एक न करी निर्धार ॥
तंव ऋषभाहातीं आणविलें शिर ॥ अर्कपुत्रें ते काळीं ॥५३॥
महाविशाल भयंकर ॥ जिव्हा लोळे मुखाबाहेर ॥
झांकिला असे सव्य नेत्र ॥ भाळीं शेंदूर चर्चिलासे ॥५४॥
बाबरझोटी धरूनी ॥ ऋषभें ठेविलें आणोनी ॥
तें सुलोचनेनें धरूनी ॥ हृदयी तेव्हां आलिंगिलें ॥५५॥
स्फुंदस्फुंदोनि सती रडत ॥ त्रिभुवनीं बळिया इंद्रजित ॥
त्याचें शिर पडिलें येथ ॥ कर्म विचित्र पूर्वींचें ॥५६॥
खालीं पसरी उत्तरीय वस्त्र ॥ त्यावरी बैसविलें तेव्हां शिर ॥
सतीनें करूनि नमस्कार ॥ विनवितसे कर जोडोनियां ॥५७॥
अयोध्यानाथ श्रीरामचंद्र ॥ पाहती स्वर्गींचे सुरवर ॥
तरी तुम्हीं हास्य करावें सत्वर ॥ जेणें श्रीराम धन्य म्हणे ॥५८॥
मजसीं विनोद नाना रीती ॥ करीतसां प्राणपती ॥
तरीच आजि क्रोध चित्तीं ॥ काय म्हणोनि धरियेला ॥५९॥
आजि अपराध समस्त ॥ समर्थें घालावे पोटांत ॥
माझा पतिव्रताधर्म बहुत ॥ रघुपतीसी दाविजे ॥१६०॥
होम विध्वंसिला म्हणोन ॥ तेणें क्रोध धरिलें मौन ॥
कीं समरीं जय न देखोन ॥ म्हणोनि खेद वाटला ॥६१॥
कीं रामदर्शना शिर आणिलें ॥ सायुज्यपद प्राप्त जाहलें ॥
म्हणोनि बोलणें खुंटलें ॥ जन्ममरण तुटले पैं ॥६२॥
इत्यादि भाव ते अवसरीं ॥ बोलिली फणिपाळकुमरी ॥
किंचित विनोदही करी ॥ सुलोचना हांसवावया ॥६३॥
शूर्पणखा तुमची आत ॥ ते जयस्थानीं गौरविली बहुत ॥
कर्ण नासिक सुमित्रासुत ॥ घेऊनि गेला आरंभीं ॥६४॥
भगिनीचें देखोनि भूषण ॥ आनंदला पितृव्य कुंभकर्ण ॥
तेणें नासिक आणि कर्ण ॥ सुग्रीवासी समर्पिले ॥६५॥
ऐसा विनोद करितां ॥ परी शिर न हांसे तत्वतां ॥
मग सहस्रवदनदुहिता ॥ खेद परम करीतसे ॥६६॥
म्हणे मी पूर्वीं चुकल्ये यथार्थ ॥ जरी पितयासी साह्य आणित्यें येथ ॥
तरी तुमचे शत्रू समस्त ॥ पराभविता क्षणार्धें ॥६७॥
ऐसी ऐकतांचि मात ॥ गदगदां तेव्हां शिर हांसत ॥
सव्य नेत्र उघडोनि पाहत ॥ जेवीं विकासे कमळिणी ॥६८॥
श्रीरामास पुसती वानर ॥ काय गोष्टीस हांसले शिर ॥
याउपरी राजीवनेत्र ॥ काय बोलता जाहला ॥६९॥
म्हणे इचा पिता सहस्रवदन ॥ तोचि अवतरला लक्ष्मण ॥
त्या श्वशुरें मज मारिलें म्हणोन ॥ शिर हांसलें गदगदां ॥१७०॥
अज्ञानरूप वामनयन ॥ मी त्यास न दिसे सगुण ॥
ज्ञानमय सव्य नयन ॥ उघडोनि मज विलोकी ॥७१॥
वानर डोलविती मान ॥ सुलोचना देवी धन्य धन्य ॥
सकळ सतियांमाजी निधान ॥ शिर अचेतन हांसविलें ॥७२॥
तंव तो वीर लक्ष्मण ॥ व्यापिला मायामोहेंकरून ॥
सुलोचनेकडे पाहोन ॥ आंसुवें नयन भरियेले ॥७३॥
रघुत्तमाप्रती बोलत ॥ अन्याय केला म्यां यथार्थ ॥
प्रत्यक्ष मारून जामात ॥ कन्या सुलोचना श्रमविली ॥७४॥
ऐसा शोकार्णवीं लक्ष्मण ॥ पडतां देखोनि रघुनंदन ॥
म्हणे बारे क्षत्रियधर्म दारुण ॥ देवें पूर्वींच निर्मिला ॥७५॥
बंधु अथवा पितापुत्र ॥ समरीं आलिया समोर ॥
त्यासी वधितां अणुमात्र ॥ दोष नसे सहसाही ॥७६॥
सौमित्र म्हणे श्रीरामा ॥ विश्वफलांकितद्रमा ॥
अजअजित पूर्णकामा ॥ तुम्हीं बोलिलां ते सत्य सर्व ॥७७॥
मायाचक्र महादुर्गम ॥ प्रियावियोगें वाटे श्रम ॥
सीतेलागीं तुम्हीं कष्टोनि परम ॥ वृक्ष पाषाण आलिंगिलें ॥७८॥
ऐसी ऐकातांचि मात ॥ कृपेनें द्रवला रघुनाथ ॥
म्हणे मी उठवीन इंद्रजित ॥ करीन ऐक्य उभयतांसी ॥७९॥
इंद्रकरीं आणोनि अमृत ॥ आतांचि उठवीन शेषजामात ॥
ऐकतां महावीर तेथे ॥ गजबजिले ते काळीं ॥१८०॥
खूण दावी सूर्यनंदन ॥ हे मनी न धरावें आपण ॥
विमानीं देव संपूर्ण ॥ भयभीत जाहले ॥८१॥
अंगद दावी करपल्लवीं ॥ बिभीषण किंचित मान हालवी ॥
जांबुवंत नेत्रसंकेत दावी ॥ नका करूं हे अघटित ॥८२॥
मग निर्भिडपणें वायुतनय ॥ बोलिला जो सर्वांसी प्रिय ॥
म्हणे तुमचें ठेवा औदार्य ॥ एकीकडे नेऊनियां ॥८३॥
अजा म्हणोनि न पाळिजे वृक्र ॥ मित्र म्हणों नये दंदशूक ॥
विषतरूचें काय सार्थक ॥ दुग्ध घालोनि वाढवितां ॥८४॥
इंद्रजिताचें बळें देव ॥ रावणें घातले बंदी सर्व ॥
याचें कापट्य वासव ॥ तोही नेणें सर्वथा ॥८५॥
सौमित्र बोलिला वचन ॥ जेणें होय सर्वांचे समाधान ॥
तैसें करावें आपण ॥ रघुनंदन यथार्थ म्हणे ॥८६॥
सुलोचनेसी म्हणे मित्रपुत्र ॥ पतीचें शिर घेऊनि जाय सत्वर ॥
निराशा देखोनि उत्तर ॥ सती सुलोचना बोलतसे ॥८७॥
दृष्टीं देखिला रघुनाथ ॥ इतुकेन सर्व कृतकृत्य ॥
म्हणोनि रामचरणीं ठेवित ॥ मस्तक पुन्हां सुलोचना ॥८८॥
सव्य घालोनि रघुवीर ॥ मागुता घाली नमस्कार ॥
उभी राहिली जोडोनि कर ॥ काय उत्तर बोलिली ॥८९॥
म्हणे आदिपुरुषा वैकुंठनायका ॥ मत्स्यरूपा वेदोद्धारका ॥
कमठरूपा सृष्टिपाळका ॥ आदिवराहस्वरूप तूं ॥१९०॥
तो तूं स्तंभोद्‌भव नरहरी ॥ वामनरूप मधुकैटभारी ॥
तीन सप्तके धरित्री ॥ केली निःक्षत्री तुवांचि ॥९१॥
तोचि तूं आतां रघुनाथ ॥ कौसल्यात्मज जनकजामात ॥
माता पिता बंधु सर्व गोत ॥ तूंचि माझें जगद्वंद्या ॥९२॥
मदनशत्रुहृदयआरामा ॥ परत्रींचा सोयरा तूं श्रीरामा ॥
दीनबंधु सर्वोत्तमा ॥ पूर्णब्रह्मा जगद्‌गु ॥९३॥
लंकेकडे आजि तत्वतां ॥ कपी न धाडावे सर्वथा ॥
मज अग्निप्रवेश करितां ॥ विक्षेप कोणी न करावा ॥९४॥
अवश्य म्हणोनि जगदुद्धार ॥ सतीचे मस्तकीं ठेविला कर ॥
सुलोचना वारंवार ॥ नमस्कार करी राघवा ॥९५॥
नेत्रद्वारें न्याहाळून ॥ हृदयी रेखिला रघुनंदन ॥
जयजय राम म्हणोन ॥ शिर घेऊनि चालिली ॥९६॥
मग रणमंडळीं येऊन सत्वर ॥ घेतलें पतीचें शरीर ॥
समुद्रतीरीं भयंकर ॥ विस्तीर्ण कुंड रचियेले ॥९७॥
मंदोदरीसहित लंकानाथ ॥ सहपरिवारें पातला तेथ ॥
विमानीं देव समस्त ॥ पाहती कौतुक सतीचें ॥९८॥
सुलाचनेनें करूनि स्नान ॥ सौभाग्यकारक देत वाण ॥
कुंडी पतीची तनु घालून ॥ महाअग्नि चेतविला ॥९९॥
कुंडासी प्रदक्षिणा करूनि येरी ॥ धर्मशिळेवरी शेषकुमरी ॥
उभी ठाकोनि ते अवसरीं ॥ पाहे अंबरीं न्याहाळूनि ॥२००॥
धडकत दुंदुभीचे ध्वनी ॥ सुरांची दाटी झाली विमानी ॥
सकळ सुरांगना गगनीं ॥ अक्षय्य वाणें घेऊनि उभ्या ॥१॥
तंव दिव्य शरीर पावोनी ॥ इंद्रजित देखिला विमानी ॥
ऐसे देखतांचि नयनीं ॥ प्राण जाहला कासाविस ॥२॥
शरीर टाकूनि त्वरितगती ॥ आंतूत निघाली आत्मज्योती ॥
दिव्य देह पावोनि निश्चिंतीं ॥ पतीपाशीं पावली ॥३॥
मग शरीर उलंडोन ॥ अग्निमुखीं घातलें नेऊन ॥
तेव्हां मंदोदरी आणि रावण ॥ शोक करिती अत्यंत ॥४॥
सिंधुसंगमीं करूनि स्नान ॥ सहपरिवारें परतला रावण ॥
मंदोदरीसहित करीत रुदन ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥५॥
घरोघरी लोक वानीत ॥ म्हणती यशस्वी अयोध्यानाथ ॥
एकपत्‍नीव्रत सत्य ॥ केलें सार्थक सुलोचनेचें ॥६॥
परिसोत सर्व पंडित ॥ अग्निपुराणीं सत्यवतीसुत ॥
बोलिला कथा हे यथार्थ ॥ नाहीं विपरित सर्वथा ॥७॥
कथा रसिक बहु पाहीं ॥ म्हणोनि योजिली श्रीरामविजयीं ॥
श्रोते धरोन सदा हृदयीं ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥८॥
पुढें कथा गोड गहन ॥ अहिरावण महिरावणाख्यान ॥
पाताळासी रामलक्ष्मण ॥ चोरूनियां नेतील ॥९॥
तेथें धांवण्या धांवेल हनुमंत ॥ ते कथा ऐकोत प्रेमळ भक्त ॥
ब्रह्मानंद अत्यद्‌भुत ॥ हृदयीं तेणें ठसावें ॥२१०॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पुराणपुरुषा अनादिसिद्धा ॥
निर्गुणा जगदंकुरकंदा ॥ जगद्वंद्या अभंगा ॥११॥
स्वति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतूर ॥ त्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२१२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय एकतिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जो रणरंगधीर रघुवीर ॥ रविकुळमंडण राजीवनेत्र ॥
रजनीचरांतक ॥ रमणीयगात्र ॥ राजेश्वर रमापति ॥१॥
आत्माराम अयोध्यानाथ ॥ आनंदरूप अक्षय अव्यक्त ॥
परात्पर अमल नित्य ॥ आद्य अनंत अनादि जो ॥२॥
जो कर्ममोचक कैवल्यदानी ॥ करुणासमुद्र कार्मुकपाणी ॥
बंधच्छेदक कल्मष जाळूनी ॥ करी कल्याण भक्तांचें ॥३॥
परमानंदा पुराणपुरुषा ॥ पद्मजातजनका पयोनिधिवासा ॥
पंकजनेत्रा परमहंसा ॥ पशुपतिहृदयजीवना ॥४॥
मनमोहना मंगलधामा मंगलधामा ॥ मुनिजनहृदया मेघश्यामा ॥
मायातीता मनविश्रामा ॥ मानववेषधारका ॥५॥
दीनदयाळा दशरथनंदना ॥ दशमुखांतका दुष्ट दलना ॥
दानवरिपुदरिद्रच्छेदना ॥ दशावतारवेषधारका ॥६॥
तिसावे अध्यायीं अनुसंधान ॥ सुलोचना प्रवेशली अग्न ॥
यावरी विंशतिनयन ॥ चिंताक्रांत शोक करी ॥७॥
बंधु पुत्र पडिले रणीं ॥ आतां पाठिराखा न दिसे कोणी ॥
तों विद्युज्जिव्ह ते क्षणीं ॥ प्रधान बोलता जाहला ॥८॥
म्हणे अहिरावण महिरावण ॥ पाताळीं राहती दोघेजण ॥
ते कापट्यविद्येंकरून ॥ राम सौमित्रां नेतील ॥९॥
कालिकापुढें तत्काळीं ॥ समर्पितील दोघांचे बळी ॥
ऐसें ऐकतां दशमौळी ॥ परम संतोष पावला ॥१०॥
रावणें पत्र पाठविलें लिहून ॥ तत्काळ प्रकटले दोघेजण ॥
कीं ते कामक्रोधचि येऊन ॥ अहंकारासी भेटले ॥११॥
त्या दोघांसी अलिंगून ॥ मयजापति करी रुदन ॥
इंद्रजिताचें वर्तमान ॥ दोघांप्रति निवेदिलें ॥१२॥
यावरी ते दोघे बोलत ॥ आतां गत शोक ते बहु असोत ॥
सौमित्र आणि रघुनाथ ॥ रजनीमाजी नेऊं तयां ॥१३॥
मग वरकड सेनेचा संहार ॥ करावया तुम्हां काय उशीर ॥
ऐकतां दशकद्वयनेत्र ॥ परम संतोष पावला ॥१४॥
तों बिभीषणाचे दोघे प्रधान ॥ गुप्तरूपें गोष्टी ऐकून ॥
तिहीं पवनवेगें जाऊन ॥ कथिलें रावणानुजासी ॥१५॥
तेणें नळ नीळ जांबुवंत ॥ मारुतीयांसी केलें श्रुत ॥
हनुमंतें पुच्छदुर्ग अद्‌भुत ॥ सेनेभोंवतां रचियेला ॥१६॥
वेढियावरी वेढे घालूनी ॥ वज्रदुर्ग उंचविला गगनीं ॥
वरी ठायीं ठायीं द्रुमपाणी ॥ गात बैसले सावध ॥१७॥
निशा गहन ते काळीं ॥ कीं काळपुरुषाची कांबळी ॥
कीं जगावरी खोळ घातली ॥ अज्ञानाची अविद्येनें ॥१८॥
निशीमाजी पक्षी बहुत ॥ वृक्षीं नानाशब्द करित ॥
रिसें वडवाघुळें तेथ ॥ लोळकंबती शाखेवरी ॥१९॥
भूतें आणि यक्षिणी ॥ गोंधळ घालिती महावनीं ॥
महाज्वाळरूप दावूनी ॥ गुप्त होती अप्सरा ॥२२॥
स्मशानीं मातले प्रेतगण ॥ भयानक रूपें दारुण ॥
छळिती अपवित्रालागोन ॥ पवित्र देखोनि पळती ते ॥२१॥
पिंगळे थोर किलबिलती ॥ भालवा दिवाभीतें बोभाती ॥
चक्रवाकांचे शब्द उमटती ॥ टिटवे बोलती ते वनीं ॥२२॥
कुमुदीं मिलिंद मिळती सवेग ॥ मस्तकमणी निघती उरग ॥
निधानें प्रकटली सांग ॥ येऊं म्हणती सभाग्या ॥२३॥
असो ऐसी निशा दाटली थोर ॥ तों पातले दोघे असुर ॥
दुर्गावरी गर्जती वानर ॥ मार्ग अणुमात्र दिसेना ॥२४॥
असुरकरीं तीक्ष्ण शूळ ॥ फोडू पाहती दुर्ग सबळ ॥
तों शूळ मोडले तत्काळ ॥ कोट अचळ वज्राहूनी ॥२५॥
मग ते ऊर्ध्वपंथे उडोनी ॥ दुर्गमर्यादा ओलांडूनी ॥
जेथें निजले लक्ष्मण कोदंडपाणी ॥ उतरले तेथें अकस्मात ॥२६॥
तों कनकहरिणचर्मावरी ॥ निद्रिस्थ दोघे लीलावतारी ॥
कीं शिव आणि विष्णु शेजारीं ॥ अवनीवरी निजेले ॥२७॥
आधींच निद्रासुख घन ॥ वरी राक्षसें घातलें मौन ॥
शय्येसहित उचलोन ॥ मस्तकीं घेऊन चालिले ॥२८॥
तेथेंच कोरिलें विवर ॥ लांब योजनें सप्त सहस्र ॥
सप्त घटिकेत यामिनीचर ॥ घेऊन गेले दोघांसी ॥२९॥
पुढें तेरा सहस्र योजन ॥ दधिसमुद्र ओलांडून ॥
तेथें महिकावती नगर पूर्ण ॥ लंकेहूनि विशेष ॥३०॥
काम क्रोध दोघेजण ॥ आत्मयासी घालिती आवरण ॥
तैसे निशाचरीं रामलक्ष्मण ॥ सदनीं दृढ रक्षिले ॥३१॥
नगरमध्यभागीं देऊळ ॥ एकवीस योजनें उंच सबळ ॥
तें भद्रकालीचें मुख्य स्थळ ॥ महाविशाळ भयानक ॥३२॥
असो दधिसमुद्रतीरीं जाण ॥ वीस कोटि पिशिताशन ॥
मकरध्वज बलाढ्य पूर्ण ॥ दृढ रक्षणा ठेविला ॥३३॥
महिकावतींत रामलक्ष्मण ॥ निद्रिस्थ आणि वरी मोहन ॥
त्यावरी नागपाशीं बांधोन ॥ बैसती रक्षण अहिमही ॥३४॥
असो हकडे सुवेळेसी जाण ॥ काय जाहलें वर्तमान ॥
निशी संपतां चंडकिरण ॥ उदयाचळा पातला ॥३५॥
घ्यावया रघुनाथदर्शन ॥ समस्त पावले वानरगण ॥
तों शय्येसहित पूर्ण ॥ दोन्ही निधानें न दिसती ॥३६॥
तंव देखिलें भयानक विवर ॥ घाबरे पाहती वानर ॥
सुग्रीवादिक कपी समग्र ॥ गजबजिले देखोनियां ॥३७॥
मग पाहती वानर ॥ तों द्वादश गांवें पाय थोर ॥
असुरांचे उमटले भयंकर ॥ रघुवीर भक्त पाहती ॥३८॥
या चराचराचें जीवन ॥ जें कमलोद्‌भवाचें देवतार्चन ॥च
ोरीं चोरिलें म्हणोन ॥ हृदय पिटी सुग्रीव ॥३९॥
सकळ वानर तैं आक्रंदती ॥ धरणीवरी अंगें घालिती ॥
एक नाम घेऊनि हाका फोडिती ॥ धांव रघुपते म्हणोनियां ॥४०॥
जगद्वंद्या राजीवनेत्रा ॥ कां उबगलासी आम्हां वानरां ॥
तूं परात्पर आदिसोयरा ॥ कोठें गेलासी उपेक्षोनि ॥४१॥
तों बिभीषण आला धांवोन ॥ म्हणे स्थिर असा अवघे जण ॥
ही गोष्ट जातां बाहेर पूर्ण ॥ येईल रावण युद्धासी ॥४२॥
रामाविण सेना समग्र ॥ जैसें प्राणाविण शरीर ॥
तरी फुटों न द्यावा समाचार पुढें विचार करा आतां ॥४३॥
पिंडब्रह्मांड तत्त्वांसहित ॥ शोधी जैसा सद्रुरुनाथ ॥
मग वस्तु निवडी शाश्वत ॥ सीताकांत शोधा तैसा ॥४४॥
कीं धुळींत हारपलें मुक्त ॥ झारी निवडी सावचित्त ॥
कीं वेदांतींचा अर्थ पंडित ॥ उकलोनियां काढी जेवीं ॥४५॥
कीं समुद्रीं पडले वेद ॥ ते मत्स्यरूपें शोधी मुकुंद ॥
तैसा सीताहृदयाब्जमिलिंद ॥ शोधोनियां काढावा ॥४६॥
तुम्हीं रघुपतीचे प्राणमित्र ॥ भगीरथप्रयत्‍न करूनि थोर ॥
तुमचा प्रतापरोहिणीवर ॥ निष्कलंक उदय पावूं द्या ॥४७॥
तुमचे भाग्यासी नाहीं पार ॥ सुखरूप आहे वायुकुमर ॥
तो क्षणमात्रें रघुवीर ॥ काढील आतां शोधूनियां ॥४८॥
मग मारुतीपुढें वानर ॥ घालिती कित्येक नमस्कार ॥
म्हणती तुजविण रघुवीर ॥ ठायीं न पडे सर्वथा ॥४९॥
रामप्राप्तीसी कारण ॥ तूं सद्रुरु आम्हांसी पूर्ण ॥
कामक्रोध अहिमही निवटून ॥ आत्माराम दाखवीं ॥५०॥
पुर्वीं सीताशुद्धि केली पाहीं ॥ आतां रामासी पाडीं ठायीं ॥
ऐसें ऐकतां ते समयीं ॥ राघवप्रिय बोलत ॥५१॥
म्हणे न लागतां एक क्षण ॥ विरिंचिगोळ हा शोधीन ॥
बंधुसहित सीतारमण ॥ सुवेळेसी आणितों ॥५२॥
मग म्हणे सुग्रीवा बिभीषणा ॥ तुम्ही रक्षावी कपिसेना ॥
विजयश्रियेसी अयोध्याराणा ॥ असुर निवटूनि आणितों ॥५३॥
नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ घेऊनि प्रवेशे विवरांत ॥
सात सहस्र योजनें तेथ ॥ अंधकार घोर पैं ॥५४॥
चौघे कासाविस होऊन ॥ मार्गीं पडिले मूर्च्छा येऊन ॥
मग ते मारुतीनें बांधोन ॥ आणिले उचलोनि बाहेरी ॥५५॥
लागतांचि शीतळ पवन ॥ सावध झाले चौघेजण ॥
प्रकाश देखोनियां नयन ॥ उघडिते जाहले ते काळीं ॥५६॥
तंव वीस कोटी राक्षस घेऊन ॥ मकरध्वज बैसला रक्षण ॥
मग पांचही वेष पालटून ॥ कावडी होऊनि चालिले ॥५७॥
तंव दटाविती असुर तयांतें ॥ कोठें रे जातां येणेंपंथें ॥
येरू म्हणती जातों तीर्थातें ॥ महिकावती पाहावया ॥५८॥
अंतरिक्ष करोनि उड्डाण ॥ घेऊं कालिकेचें दर्शन ॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ सर्व राक्षस क्षोभले ॥५९॥
सबळ दंड उचलून ॥ कपींसी करिती ताडण ॥
मग हनुमंतें पायीं धरून ॥ मारिलें आपटून तत्काळीं ॥६०॥
ऐसें देखतां विपरीत ॥ राक्षस धांवले समस्त ॥
प्रतापरुद्र हनुमंत ॥ जैसा कृतांत क्षोभला ॥६१॥
असंख्यात कुंजरभारीं ॥ प्रवेशती पांच केसरी ॥
तैसे पांचांनीं ते अवसरीं ॥ राक्षस सर्व मारिले ॥६२॥
वीस कोटी पिशिताशन ॥ पांच वीरीं भारे बांधोन ॥
पृथ्वीवरी आपटून ॥ समुद्रांत भिरकाविले ॥६३॥
तो मकरध्वज धांवोन ॥ भिडला मारुतीसीं येऊन ॥
मुष्टिप्रहारें करून ॥ एकमेकांसीं ताडिती ॥६४॥
सप्त पाताळें दणाणत ॥ परम क्षोभला हनुमंत ॥
हृदयीं देऊनि मुष्टिघात ॥ मकरध्वज पाडिला ॥६५॥
वक्षस्थळीं मारुती बैसोन ॥ म्हणे तुज आतां सोडवील कोण ॥
येरु म्हणे अंजनीनंदन ॥ जवळी नाहीं ये काळीं ॥६६॥
तो जरी येतां धांवोन ॥ तरी तुज करता शतचूर्ण ॥
तोचि माझा पिता जाण ॥ ऐकोनि मारुती शंकला ॥६७॥
मग तयासी हातीं धरून ॥ म्हणे सांग कैसें वर्तमान ॥
ब्रह्मचारी हनुमंत पूर्ण ॥ तूं सुत कैसा जाहलासी ॥६८॥
मीच हनुमंत रुद्रावतार ॥ तूं म्हणवितोसी माझा कुमर ॥
सांगाती हांसती साचार ॥ सांग प्रकार कैसा तो ॥६९॥
येरू म्हणे लंकादहन ॥ करून येतां वायुनंदन ॥
स्वेदें शरीर संपूर्ण ॥ ओलावलें ते काळीं ॥७०॥
तो स्वेद निपटोन ॥ कपाळींचा टाकिला जाण ॥
तो समुद्रीं पडतां मगरीनें ॥ गिळिला तोचि मी जन्मलो ॥७१॥
ऐसा वृतांत सांगूनी ॥ पुत्रें मस्तक ठेविला चरणीं ॥
तों मगरी आली धांवोनी ॥ वल्लभासी पहावया ॥७२॥
म्हणे स्वरूप दिसतें लहान ॥ जेव्हां केलें लंकादहन ॥
त्याकाळींचे स्वरूप पूर्ण ॥ प्रकटून संशय फेडावा ॥७३॥
मग भीमरूप धरिलें ते क्षणीं ॥ मगरी लागली दृढ चरणीं ॥
म्हणे चिंता न करावी मनीं ॥ अयोध्यानाथ सुखी असे ॥७४॥
अहिमही कपटी दोघेजण ॥ घेऊनि आले रामलक्ष्मण ॥
उदयीक देवीपुढें नेऊन ॥ बळी समर्पितील दोनप्रहरां ॥७५॥
आपण देऊळांत जाऊन ॥ बैसावें गुप्तरूपेंकरून ॥
ते स्थळीं रामलक्ष्मण ॥ भेटतील तुम्हांसी ॥७६॥
ऐसें ऐकतां सीताशोकहरण ॥ बोलता जाहला संतोषोन ॥
म्हणे असुरांतें बधोन ॥ तुझा नंदन स्थापीन त्या स्थळीं ॥७७॥
येरी म्हणे महिकावती नगर ॥ त्रयोदश सहस्र योजनें दूर ॥
आडवा समुद्र दुस्तर ॥ तरी विचार माझा एक ऐका ॥७८॥
तुम्ही पांचही बलवंत ॥ बसावें माझे वदननौकेंत ॥
महिकावतीस नेऊन त्वरित ॥ पुढती आणीन या स्थळीं ॥७९॥
नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ ऐकतां जाहले भयभीत ॥
म्हणती मगरमिठी अद्‌भुत ॥ भक्षील उदकांत नेऊनियां ॥८०॥
तरी मारुति ऐके वचन ॥ आम्हीं रक्षितो हें स्थान ॥
तुजवांचोनि सिंधुलंघन ॥ सर्वथा नव्हे कोणासी ॥८१॥
मग तेथें उभा राहोन ॥ हनुमंतें चिंतिले श्रीरामचरण ॥
जय यशस्वी श्रीराम म्हणोन ॥ अकस्मात उडाला ॥८२॥
मनोवेगें हनुमंत ॥ आला तेव्हां महिकावतींत ॥
एकवीस दुर्गे रक्षकांसहित ॥ कोणासी नकळत ओलांडिलीं ॥८३॥
अणुरेणूहूनि लहान ॥ जाहला सीताशोकहरण ॥
भद्रकालींचे देवालय देखोन ॥ आंत संचरला ते काळीं ॥८४॥
कापट्य अनुष्ठानें बहुत ॥ राक्षस करिती देउळांत ॥
मद्य मांस विप्रप्रेत ॥ पूजनासी ठेविलें ॥८५॥
भ्रष्ट शास्त्रें काढिती ॥ एकासी एक वचन देती ॥
ऐसें करितां मोक्षप्राप्ती ॥ प्रमाण ग्रंथी लिहिलें असे ॥८६॥
ऐसें ऐकतां रामभक्त ॥ म्हणे यांसी कैसा मोक्ष प्राप्त ॥
आतां कपाळमोक्ष त्वरित ॥ पावती हस्तें माझिया ॥८७॥
असो देवालयीं जाऊनि महारुद्र ॥ देवी उचलोनि सत्वर ॥
नाहाणींत टाकूनि द्वार ॥ दृढ झांकिलें हनुमंते ॥८८॥
वज्रकपाटें देऊनी ॥ आपण बैसला देवीस्थानीं ॥
सर्वांग शेंदूर चर्चूनी ॥ जाहला भवानी हनुमंत ॥८९॥
देवी मारुतीकडे पाहात ॥ तो भयानक रूप दिसे बहुत ॥
जैसा हरिणीचे गृहांत ॥ महाव्याघ्र प्रवेशला ॥९०॥
तों येरीकडे असुर बहुत ॥ षड्ररस अन्नांचे पर्वत ॥
पूजासामुग्री अद्‌भुत ॥ घेऊनि अहिमही तेथें पातले ॥९१॥
तों वज्रकपाटें दिधली ॥ ती न उघडती कदाकाळीं ॥
एक म्हणती देवी क्षोभली ॥ म्हणूनि स्तुति करिताती ॥९२॥
ऐसा लोटला एक मुहूर्त ॥ तों रुद्ररूपिणी आंत बोलत ॥
म्हणे धन्य तुम्ही भक्त ॥ बळीसी रघुनाथ आणिला ॥९३॥
लंकेपुढें बहुतांचे प्राण ॥ मींच घेतले सत्यवचन ॥
तुमचें करावया भोजन ॥ येथें साक्षेपें पातलें ॥९४॥
माझें रूप बहुत तीव्र ॥ पाहतां जातील तुमचे नेत्र ॥
तरी पाडूनि गवाक्षद्वार ॥ पूजा आधीं समर्पा ॥९५॥
ऐसें देवी बोले आंतूनी ॥ अहिमही हर्षले ते क्षणीं ॥
म्हणती धन्य आम्हीं त्रिभुवनीं ॥ भक्तशिरोमणी दोघेही ॥९६॥
मग देउळमस्तकी विशाळ ॥ गवाक्ष पाडिलें तत्काळ ॥
पंचामृताचे घट सजळ ॥ स्नानालागीं ओतिले ॥९७॥
तों मुख पसरूनि हनुमंत ॥ घटघटां प्राशी पंचामृत ॥
पाठीं शुद्धोदक ओतीत ॥ प्रक्षाळिलें मुख तेणें ॥९८॥
धूप दीप वास ते समयीं ॥ देवीस म्हणे हे तूं घेईं ॥
सवेंच म्हणे भक्तां लवलाहीं ॥ नैवेद्य झडकरी येऊं द्या ॥९९॥
मग भरोनि विशाळ पात्रें ॥ अन्न ओतिती एकसरें ॥
जय जय देवी म्हणोनि गजरे ॥ असुर सर्व गर्जती ॥१००॥
सव्य अपसव्य हस्तेंकरूनि ॥ स्वाहा करीत रुद्ररूपिणी ॥
जैसा दवाग्नि चेतला वनीं ॥ तो नाना -काष्टें भक्षीत ॥१॥
पंचभक्ष्य परमान्न ॥ बहुत रंगाचें ओदन ॥
शाखा लवण शाखा आणोन ॥ असंख्यात रिचविती ॥२॥
दधि दुग्ध घृत नवनीत ॥ यांचे पाट सोडिले बहुत ॥
जैशा वर्षाकाळीं सरिता धांवत ॥ समुद्रासी भेटावया ॥३॥
पुजारे लोहदंडें घेउनी ॥ मोकळी करिती तेव्हां नाहाणी ॥
प्रसाद बाहेर यावा म्हणोनी ॥ प्रयत्‍न करिती बहुसाल ॥४॥
तंव तेथें देवी बैसली भयभीत ॥ तिजवरी लोहदंड आदळत ॥
ती म्हणे संकट बहुत ॥ मज येथें ओढवलें ॥५॥
असुरीं आणिले दशरथसुत ॥ नैवेद्य ग्रासितो हनुमंत ॥
मज ताडण होय येथ ॥ कोणासी अनर्थ सांगा हा ॥६॥
असो नाहाणी मोकळी करिती असुर ॥ परी कांहींच नये बाहेर ॥
म्हणती आजि देवीनें समग्र ॥ ग्रासिलें हाचि निर्धार पैं ॥७॥
वृद्ध वृद्ध असुर बोलत ॥ कैंची देवी मांडिला अनर्थ ॥
इहीं चोरूनि आणिला रघुनाथ ॥ बरवा अर्थ दिसेना ॥८॥
रावणें चोरिली सीता सुंदर ॥ तेथें अकस्मात आला एक वानर ॥
तेणें नगर जाळूनि समग्र ॥ केला संहार बहूतांचा ॥९॥
तैसेंच मांडले येथ ॥ ऐसें बोलोनि बुद्धिवंत ॥
निजस्थानासी त्वरित ॥ जाते जाहले ते काळीं ॥११०॥
असो इकडे अन्नाचे पर्वत ॥ ओतितां असुर भागले समस्त ॥
परी देवी नव्हेच तृप्त ॥ पुरे न म्हणे सर्वथा ॥११॥
मग घातलें शुद्ध जळ ॥ सवेंचि अर्पिले तांबूल ॥
तेव्हां हाक फोडूनि प्रबळ ॥ रुद्ररूपिणी बोलतसे ॥१२॥
म्हणे मी तुष्टल्यें आजि पूर्ण ॥ तुम्हांसी अक्षयपद देईन ॥
तुम्ही आणि लंकापति रावण ॥ करीन समान दोहींचें ॥१३॥
माझी प्रसन्नता लवलाह्या ॥ आतांच येईल प्रत्यया ॥
ऐसे शब्द देवीचे परिसोनियां ॥ शहाणे चालिले गृहासी ॥१४॥
देवी म्हणे याउपरी ॥ राम सौमित्र आणा झडकरी ॥
सगळेचि घाला देवळाभीतरीं ॥ याउपरी कौतुक पहा ॥१५॥
सच्चिदानंद रघुवीर ॥ ज्याचिया स्वरूपा नाहीं पार ॥
जो वेदशास्त्रांसी अगोचर ॥ त्यास गिळीन सगळाचि ॥१६॥
ऐसे शब्द देवीचे ऐकोन ॥ हर्षले अहि मही दोघेजण ॥
वीस असुर चालिले घेऊन ॥ रामलक्ष्मण आणावया ॥१७॥
रविकुळींचीं निधानें दोन्ही ॥ ठेविलीं नागपाशीं आकर्षूनी ॥
तीं सोडोनियां ते क्षणीं ॥ रथासी दृढ बांधिले ॥१८॥
मग काढिलें मोहनास्त्र ॥ सावध जाहले रामसौमित्र ॥
राजीवाक्ष उघडी नेत्र ॥ तों सभोंवते असुर दाटले ॥१९॥
श्रीराम सौमित्रासी बोले ॥ बा रे शत्रूंनीं आपणांसी आणिलें ॥
आमचें धनुष्य बाण हिरोनी नेलें ॥ रथीं बांधिलें दृढ आम्हां ॥१२०॥
जानकीसारिखें चिद्रत्‍न ॥ गेलें दुःखसागरी बुडोन ॥
भरत त्यागील आतां प्राण ॥ हें वर्तमान जातांचि ॥२१॥
कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ प्राण देतील ऐकतांक्षणीं ॥
वसिष्ठादि महामुनी ॥ दुःखचक्रीं पडतील ॥२२॥
बिभीषण सुग्रीव हनुमंत ॥ नळ नीळ अंगद जांबुवंत ॥
माझे प्राणसखे समस्त ॥ प्राण देतील ऐकतां ॥२३॥
देव समस्त बंदीं पडले ॥ त्यांचे धैर्यदुर्ग आजि खचले ॥
क्षुधित पात्रावरूनि उठविलें ॥ तैसें झालें देवांसी ॥२४॥
आतां असावें धैर्य धरून ॥ जरी संकटीं पावेल उमारमण ॥
तरी हें क्षणमात्रें विघ्न ॥ निरसोनि जाईल सौमित्रा ॥२५॥
जो साक्षात रुद्रवतार ॥ तो आमुचा हनुमंत साचार ॥
येथें जरी पातला सत्वर ॥ तरी असुर संहरितां ॥२६॥
साक्षात शेष नारायण ॥ अवतारी पुरुष रामलक्ष्मण ॥
समयासारिखें वर्तमान ॥ दाविती खूण जाणिजे ॥२७॥
असो राक्षसीं रामसौमित्र ॥ रथीं बांधिले दृढ सत्वर ॥
सिंधूरवर्ण पुष्पहार ॥ गळां घातले तेधवां ॥२८॥
वरी उधळिती शेंदूर ॥ पुढें होतसे वाद्यांचा गजर ॥
नग्न शस्त्रें करून समग्र ॥ असुर हांका फोडिती ॥२९॥
चालविले तेव्हां मिरवत ॥ तंव नगरलोक आले समस्त ॥
पहावया श्रीरघुनाथ ॥ एक चढती गोपुरी ॥१३०॥
देखतां दोघे सुकुमार ॥ लोकांसी न धरवे गहिंवर ॥
नेत्रीं स्रवों लागलें नीर ॥ हाहाकार जाहला ॥३१॥
नरनारी आक्रंदत ॥ एकचि वर्तला आकांत ॥
चरचर जीव समस्त ॥ पाहूनि रघुनाथ शोक करिती ॥३२॥
तीन प्रदक्षिणा करून ॥ देउळीं आणिले दोघेजण ॥
देवीचीं कपाटें उघडून ॥ आंत लोटोनि दीधले ॥३३॥
कपाटें देऊन पुढती ॥ राक्षस गोंधळ घालिती ॥
हातीं दिवट्या घेऊनि नाचती ॥ मद्य प्राशिती उन्मत्त ॥३४॥
इकडे देउळांत रामलक्ष्मण ॥ पाहाती देवीसी विलोकून ॥
तंव तिणें पसरिलें वदन ॥ मुख जैसे काळाचें ॥३५॥
हाक दिधली भयंकर ॥ म्हणे तुम्ही दोघे राजपुत्र ॥
तुम्हांसी गिळिन सत्वर ॥ तरी स्मरण करा कुळदैवत ॥३६॥
तुमचा प्राणसखा असेल पाहीं ॥ त्यासी चिंतावें देहांतसमयीं ॥
यावरी तो जनकजांवई ॥ काय बोलता जाहला ॥३७॥
जरी अनर्थी पडिले भक्त ॥ तरी माझें स्मरण करीत ॥
तो मी आजि रघुनाथ ॥ संकटीं स्मरूं कोणासी ॥३८॥
तरी माझिया प्राणांचा प्राण ॥ जिवलग सखा वायुनंदन ॥
तो असतां तरी विघ्न ॥ कदा न लागतें आम्हांसी ॥३९॥
आतां मारुतिऐसा स्नेहें विशेष ॥ माये तूंचि करी कां आम्हांस ॥
कीं जननी पाळी बाळकांस ॥ प्रीति बहुत धरूनियां ॥१४०॥
ऐकतां रघुपतीचें वचन ॥ कपीचे नेत्रीं लोटलें जीवन ॥
स्फुंदस्फुंदोनि वायुनंदन ॥ धरी चरण रामाचे ॥४१॥
तेणें नयनोदकेंकरून ॥ प्रक्षाळिले रामचरण ॥
मग तो सीताशोकहरण ॥ रूप आपुलें प्रकट करी ॥४२॥
दृष्टीं देखतां हनुमंत ॥ प्रेमें दाटला रघुनाथ ॥
उठोनि हृहयीं आलिंगित ॥ काय दृष्टांत देऊं येथें ॥४३॥
कवींनी तर्क केले बहुत ॥ परी त्या सुखास नाही दृष्टांत ॥
पाठिराखा कैवारी भक्त ॥ मारुतीऐसा नव्हेचि ॥४४॥
मारुतीस म्हणे रघुवीर ॥ म्यां घेतले अनंत अवतार ॥
तुझे न विसरे उपकार ॥ कल्पांतींही हनुमंता ॥४५॥
तुझिया उपकारा नाहीं भिती ॥ काय काय आठवूं मारुती ॥
असो यावरी उर्मिलापती ॥ हनुमंतासी भेटला ॥४६॥
श्रीराम म्हणे हनुमंता ॥ कैसा शत्रु वधावें आतां ॥
येरू म्हणे तुम्ही चिंता ॥ न करावी कांही मानसी ॥४७॥
तुम्ही मागें असा लपोन ॥ एकेक असुर बोलावून ॥
तयांचीं शिरें छेदून ॥ करीन चूर्ण येथेंचि ॥४८॥
राम म्हणे माझे धनुष्यबाण ॥ जरी देशील आणून ॥
तरी हे असुर संहारीन ॥ क्षणमात्र न लागतां ॥४९॥
तंव बोले वायुनंदन ॥ मी मारीन अहिरावण ॥
मग कपाटें उघडोन ॥ महिरावण वधा तुम्ही ॥१५०॥
तेंव्हा गुप्तरूपें हनुमंते जाऊन ॥ दोघांचे आणिले धनुष्यबाण ॥
पाठीसी लपवूनि रामलक्ष्मण ॥ आपण देवी होउनि बैसला ॥५१॥
मग म्हणे अहिरावणा ॥ तूं आधी घेईं माझ्या दर्शना ॥
ऐकातांचि ऐशा वचना ॥ येरू प्रवेशे देउळीं ॥५२॥
जैसा पंचाननाचें दरींत ॥ वारण प्रवेशे उन्मत्त ॥
कीं व्याघ्राचिये जाळीत ॥ मृग अकस्मात संचरे ॥५३॥
कीं भुजंगाचे बिळीं देख ॥ प्रवेशला जैसा मूषक ॥
कीं मरण नेणोनि पतंग मूर्ख ॥ दीपासी भेटों पातला ॥५४॥
तैसा प्रवेशे अहिरावण ॥ भयानक देवी देखोन ॥
धाकें धाकें चि नमन ॥ करिता जाहला तेधवां ॥५५॥
देवीचरणीं मस्तक ठेविला ॥ देखोनि महारुद्र क्षोभला ॥
असुर पायीं रगडिला ॥ शतचूर्ण केला मस्तक ॥५६॥
हस्त पाद झाडी ते क्षणीं ॥ तेणें दणाणली मंगळजननी ॥
तो दणाण भयंकर ऐकोनी ॥ शाहाणे उठोनि पळाले ॥५७॥
अहिरावणाचा गेला प्राण ॥ मग महिरावण बोले वचन ॥
म्हणे चार घटिका जाहल्या पूर्ण ॥ बंधु बाहेरी नयेचि ॥५८॥
काय तो पाहावया वृत्तांत ॥ पूजारी जाय देउळांत ॥
तयाचा दायदही जात ॥ त्याचे पाठीं हळूहळू ॥५९॥
देउळीं अन्नप्रसाद समूळ ॥ तो अवघा पैं नेईल ॥
म्हणोनियां उतावेळ तो देउळीं प्रवेशला ॥१६०॥
पुढील काळें ओढिला ॥ देवी नमावया गेला ॥
मत्कुणप्राय रगडिला ॥ पायांतळीं हनुमंतें ॥६१॥
ऐसें देखोनि विपरीत ॥ दुसरा चळचळां कांपत ॥
म्हणे हा होय हनुमंत ॥ लंका जेणें जाळिली ॥६२॥
आंगीं मुरकुंडी वळोन ॥ दारांत आपटला येऊन ॥
दोन्हीं हस्तेंकरून ॥ शंख करी आक्रोशें ॥६३॥
म्हणें जेणें लंका जाळिली ॥ तोच काळ बैंसला देउळीं ॥
देवी मोरींत दाटिली ॥ पूजा घेतली सर्व तेणें ॥६४॥
पूजारियासहित अहिरावण ॥ यमपुरीस पाठविला पूर्ण ॥
पिशिताशन नाम ऐकतां जाण ॥ पळों लागलें चहूंकडे ॥६५॥
राक्षसां जाहला आकांत ॥ एक एकांतें धरूनि हनुमंत ॥
तेथेंचि पाववी मृत्यु ॥ दिशा लंघोनि एक जाती ॥६६॥
मग शस्त्रें कवचें बांधोन ॥ सेनासागर एकवटून ॥
सिद्ध झाला महिरावण ॥ युद्धालागीं ते काळीं ॥६७॥
म्हणे बाहेर येई रे मर्कटा ॥ कोठें प्रवेशलासि महाधीटा ॥
आजि मृत्युपुरींचिया वाटा ॥ रामासहित लावीन तूंतें ॥६८॥
तों देऊळामाजी वायुपुत्र ॥ स्कंधी घेत राम सौमित्र ॥
कीं तें विष्णु कर्पूरगौर ॥ एका वहनीं बैसले ॥६९॥
कीं शशी आणि दिनपती ॥ बैसले दिसती एक रथीं ॥
कीं इंद्र आणि वाचस्पति ॥ एक वहनीं आरूढले ॥१७०॥
तैसें दोघे स्कंधी घेऊन ॥ बाहेर निघे वायुनंदन ॥
पादप्रहारें करून ॥ कपाटें फोडिली ॥ तत्काळीं ॥७१॥
बाहेर प्रकटतां तत्काळ ॥ पुच्छें उडवूनियां देऊळ ॥
आकाशीं भिरकाविलें सकळ ॥ जेवीं बाळ कंदुक टाकी ॥७२॥
देवालय विदारूनी ॥ देविसहित समुद्रजीवनीं ॥
टाकितां राक्षसीं मिळूनी ॥ अंजनीतनय वेढिला ॥७३॥
खालीं रामसौमित्र उतरले ॥ श्रीराम कोदंड चढविलें ॥
अचळ ठाण मांडिलें ॥ बाण लाविला चापासी ॥७४॥
महिरावणास म्हणे रघुनंदन ॥ कपटिया साहें माझे बाण ॥
तुझी वाट पाहतो अहिरावण ॥ तुज धाडीन त्याजपासी ॥७५॥
तों राक्षसें धनुष्य ओढून ॥ रामावरी सोडिले बाण ॥
रघुनाथें शिर छेदोन ॥ क्षणमात्रें टाकिलें ॥७६॥
नरवीरश्रेष्ठ रघुनंदन ॥ महिवरी सोडीत शत बाण ॥
त्याचे लल्लाटीं जाऊन ॥ एकपंक्ती बैसले ॥७७॥
परी नवल वर्तलें अद्‌भुत ॥ रुधिर बिंदु खालीं पडत ॥
त्याचे महिरावण होत ॥ एकसारिखे सर्वही ॥७८॥
लक्षांच्या लक्ष महिरावण ॥ त्यावरी राम टाकी बाण ॥
त्यांचिया रक्तबिंदुंपासून ॥ कोट्यनुकोटी निपजती ॥७९॥
तितुकेही रामावरी असुर ॥ करिते जाहले शस्त्रमार ॥
मग घाय टाळित रघुवीर ॥ चकित पाहे चहूंकडे ॥१८०॥
मग बोले चापपाणी ॥ वैरी वधावे शस्त्रेंकरूनी ॥
तंव आगळेचि होती ते क्षणीं ॥ न कळे करणी कैसी हे ॥८१॥
तंव तो निर्वाणीचा भक्त ॥ वज्रदेही वीर हनुमंत ॥
दृष्टी देखोनि विपरीत ॥ चिंताक्रांत पडियेला ॥८२॥
मग तो लोकप्राणेशनंदन ॥ मगरीपासी आला उठोन ॥
तीस पुसे वर्तमान ॥ समूळ महिरावणाचें ॥८३॥
ती म्हणे रंभा देवांगना ॥ जात होती इंद्र भुवना ॥
तंव भृगुऋषि जाणा ॥ तिणें अकस्मात देखिला ॥८४॥
त्यासी नाही केले नमन ॥ म्हणे हा कुरूप वृद्ध ब्राह्मण ॥
तंव तो महाराज तपोधन ॥ दिधला शाप दारुण तीतें ॥८५॥
म्हणे तूं सर्पिणी होऊनी ॥ विचरें सदा घोर वनीं ॥
धांवून येरी लागे चरणीं ॥ म्हणे मज उःशाप देईंजे ॥८६॥
येरू म्हणे तूं होशील सर्पिणी ॥ क्षणएक दिससी पद्मिणी ॥
एकदां सूर्यरेत पडतांक्षणी ॥ जासी उद्धरून निजपदा ॥८७॥
मग अहिरूप हिंडे वनीं ॥ क्षणएक जाहली असे पद्मिणी ॥
तों सूर्याचें विर्य वरूनी ॥ अकस्मात वर्षलें ॥८८॥
अहिंचे मुखीं वीर्य पडत ॥ तो अहिरावण जाहला अद्‌भुत ॥
महीवरी पडलें जे रेत ॥ महिरावण तोचि जाहला ॥८९॥
रंभा गेली उद्धरून ॥ परी रक्तबिंदूंचे होती महिरावण ॥
हें चंद्रसेनेस वर्तमान ॥ जाऊनियां पुसावें ॥१९०॥
अहिरावणाची पत्‍नी ॥ चंद्रसेना ते सत्यवचनीं ॥
हें हनुमंतें ऐकोनी ॥ उडे गगनीं अकस्मात ॥९१॥
महिकावतीस येऊनी ॥ प्रवेशला तेव्हां राजसदनीं ॥
तों चंद्रसेना बैसली ध्यानीं ॥ चापपाणी आठवित ॥९२॥
दृष्टीं देखोनि रघुवीर ॥ तीस वाढला कामज्वर ॥
म्हणे श्रीरामाऐसा भ्रतार ॥ जन्मोजन्मी भोगावा ॥९३॥
त्चाचि वेधेंकरून जाण ॥ तीस लागलें श्रीरामध्यान ॥
सकळ विसरली देहभान ॥ गुंतले मन राघवीं ॥९४॥
तंव तीजजवळी आला हनुमंत ॥ बळें हस्तटाळिया वाजवित ॥
येरी नेत्र उघडोनि पाहत ॥ तंव तो रामदूत देखिला ॥९५॥
हनुमंते करूनि नमन ॥ सांगे सर्व वर्तमान ॥
पुराणपुरुष रघुनंदन ॥ परम संकटीं पडियेला ॥९६॥
येरी म्हणे हें वर्तमान ॥ तुज अवघे मी सांगेन ॥
माझा मनोरथ पूर्ण ॥ जरी तूं सिद्धी पावविसी ॥९७॥
रामप्रिय म्हणे अवश्य ॥ येरी म्हणे देईं भाष ॥
पुढील कार्य जाणोनि विशेष ॥ प्रमाण दिधलें हनुमंतें ॥९८॥
येरी म्हणे ऐक वचन ॥ सुरतसुखें रघुनंदन ॥
एकदां तरी भोगीन ॥म्हणोनि भाष घेतली ॥९९॥
आतां रामासी होईल जय प्राप्त ॥ तो ऐका सावध वृत्तांत ॥
महिरावणें तप अद्‌भुत ॥ करूनि शिव तोषविला ॥२००॥
हा वर मागितला त्वरित ॥ युद्धसमयीं वर्षावें अमृत ॥
ऐक्य होतां सुधारसमुक्त ॥ उद्‌भवती महिरावण ॥१॥
भ्रमरमाळा शिवकंठी ॥ ते मिलिंद पाताळा जाती उठाउठी ॥
अमृत चंचू भरूनि वृष्टी ॥ रक्तावरी करिती त्या ॥२॥
एकत्र होतां रक्त अमृत ॥ महिरावण निजपती तेथ ॥
ऐसें ऐकतांचि हनुमंत ॥ पाताळ धुंडीत गेला असे ॥३॥
तों अमृतकुंड परम गहन ॥ तेथें लोकपाळांचे रक्षण ॥
तें तोडित वायुनंदन ॥ अमृताजवळी पातला ॥४॥
तों चंचू भरूनि अपार ॥ असंख्यात जाती भ्रमर ॥
पर्वताऐसें तयांचे शरीर ॥ केले चूर सर्वही ॥५॥
त्यांमाजी श्रेष्ठ भ्रमर ॥ मेरुपर्वताऐसें त्याचें शरीर ॥
क्रोधें धांविन्नला सत्वर ॥ वायुकुमर लक्षूनियां ॥६॥
हनुमंतें मुष्टिघात दिधला ॥ भ्रमर पृथ्वीवरी पाडिला ॥
पक्ष उपडितां ते वेळां ॥ काकुळती आला मारुतीसी ॥७॥
मज देई प्राणदान ॥ मी तुझ्या कार्यासी येईन ॥
हनुमंतें भाष घेऊन ॥ तेव्हां भ्रमर सोडिला ॥८॥
सवेंच उडाला तेथून ॥ राघवाजवळी येऊन ॥
म्हणे आतां ब्रह्मास्त्र घालोन ॥ वैरी एकदांचि आटावे ॥९॥
ऐसें बोलतां वायुसुत ॥ रघुनाथ बाणीं ब्रह्मास्त्र स्थापित ॥
शर सुटतांचि समस्त ॥ भस्म जाहले महिरावण ॥२१०॥
जैसी होतां ब्रह्मप्राप्ति ॥ संसारदुःखें वितळती ॥
कीं उगवतां गभस्ति ॥ जेवीं लपती तारागणे ॥११॥
तैसें सुटतां ब्रह्मास्त्र ॥ मुख्य रूपसहित असुर ॥
भस्म जाहले समग्र ॥ जयजयकार सुर करिती ॥१२॥
पडली देखतां मुख्य धुर ॥ पळों लागले ते असुर ॥
हनुमंतें पुच्छ समग्र ॥ सेनेभोवतें वेष्टिलें ॥१३॥
मग लोहर्गळा घेउनी ॥ सैन्य झोडी तयेक्षणीं ॥
कित्येक अंतरिक्ष उडोनि ॥ राक्षस पळती तेधवां ॥१४॥
तों वरून पुच्छें सत्वर ॥ बांधिले सर्व निशाचर ॥
सागरीं बुडविलें समग्र ॥ पुच्छें घुसळूनि आणिले ॥१५॥
एक जाती दिशा लंघून ॥ तों पुच्छ येत तिकडून ॥
ब्रह्मांड व्यापिलें संपूर्ण ॥ पुच्छेंकरूनि हनुमंतें ॥१६॥
मारुति केवळ ईश्वर ॥ त्याचे पुच्छासी नाहीं पार ॥
ब्रह्मांडाबाहेर समग्र ॥ आढेवेढे करी पुच्छ ॥१७॥
असो दशदिशा धुंडोन ॥ पुच्छें असुर आणिले ओढून ॥
महिकावतीस जाऊन ॥ पुच्छ रिघे घरोघरीं ॥१८॥
पुरुष ओढोनि काढी बाहेरी ॥ अर्गळाघायें चूर्ण करी ॥
भ्रतारा लपवोनि नारी ॥ दारीं उभ्या राहती ॥१९॥
परी पुच्छ न सोडी साचार ॥ गूढ स्थळाहून काढी असुर ॥
आकांत वर्तला थोर ॥ सांगती हेर चंद्रसेनेसी ॥२२०॥
ती म्हणे घाला जानकीची आण ॥ तेणें निरसेल हे विघ्न ॥
मग त्याचि युक्तीकरून ॥ जन सकळ वांचले॥२१॥
जयजयकार करून सुर ॥ वर्षती पुष्पसंभार ॥
रामसौमित्र वायुकुमर ॥ एके ठायीं मिळाले ॥२२॥
शत्रुक्षयाचें कारण ॥ कैसा निमाला महिरावण ॥
सौमित्रासी म्हणे सीतारमण ॥ तेणें प्रत्युत्तर दीधलें ॥२३॥
म्हणें हनुमंतें जाऊन ॥ शत्रुक्षय होय पूर्ण ॥
तें साधून आला कारण ॥ त्यास वर्तमान पुसा हें ॥२४॥
मग मारुतीचे गळां सप्रेम ॥ मिठी घाली श्रीराम ॥
तंव तो चिंताच्रकी परम ॥ पडला असे मारुती ॥२५॥
मग राम म्हणे प्राणसखया ॥ कां मुख गेलें उतरोनियां ॥
ते मज सांग लवलाह्या ॥ म्हणेन वदन कुरवाळिलें ॥२६॥
मग हनुमंत वर्तमान ॥ रामासि सांगें मुळींहून ॥
चंद्रसेनेसी भाषदान ॥ दृढ देऊनि मी आलों ॥२७॥
ऐकोनि हांसें रामचंद्र ॥ म्हणे बा रे तूं चातुर्यसमुद्र ॥
मी एकपत्‍नीव्रती वीर ॥ हे तुज काय न ठाऊकें ॥२८॥
तुझी भाषा नव्ह अप्रमाण ॥ मजही न गमे दुर्व्यसन ॥
तूं चतुरमुकुटरत्‍न ॥ युक्ति करून वारीं हें ॥२९॥
मग चंद्रसेनेच्या गृहाप्रति ॥ आला तत्काळ मारुति ॥
म्हणे आणितों अयोध्यापति ॥ मंचक दृढ घाली कां ॥२३०॥
चंद्रसेना हर्षलीं चित्तीं ॥ दृढ मंचक घातला एकांती ॥
सुमनशेज रचूनि युक्तीं ॥ नाना उपभोग ठेविले ॥३१॥
मग बोले हनुमंत ॥ मंचक मोडतां अकस्मात ॥
तरी न बैसे रघुनाथ ॥ बोल मग मज नाहीं ॥३२॥
चंद्रसेना म्हणे हनुमंता ॥ मंचक न मोडे हा तत्वंतां ॥
मग जो भ्रमर रक्षिला होता ॥ तो आणिला गुप्तरूपें ॥३३॥
रंभापत्रप्रमाण पूर्ण ॥ मंचक आंत अवघा कोरून ॥
तेणें तत्काळ आज्ञा वंदून ॥ तैसाचि केला ते काळीं ॥३४॥
चंद्रसेनेच्या गृहीं सत्वर ॥ हनुमंतें आणिला रघुवीर ॥
मंचकीं बैसतां जगदोद्धार ॥ तत्काळ चूर्ण जाहला ॥३५॥
उठोनि चालिला रघुनंदन ॥ येरी विलोकी दीनवदन ॥
वायुसुताकडे पाहून ॥ चंद्रसेना बोलतसे ॥३६॥
म्हणे कपटी तूं वानर देख ॥ तुवांचि कोरविला मंचक ॥
शेवटी नेतोसी रघुनायक ॥ मनोरथ माझे न पुरतां ॥३७॥
मी तुज शाप देईन आतां ॥ ऐकतां कृपा उपजली रघुनाथा ॥
हस्त ठेवीत तिचे माथां ॥ म्हणे चिंता न करावी ॥३८॥
माझी ध्यानमूर्ति सुंदर ॥ हृदयीं भोगीं निरंतर ॥
पुढें सत्यभामा चतुर ॥ कृष्णावतारीं होसी तूं ॥३९॥
ऐसें बोलतां रघुनाथ ॥ ती तेथेंचि जाहली समाधिस्थ ॥
पुढें महाकावतींत नृपनाथ ॥ मकरध्वज स्थापिला ॥२४०॥
स्कंधीं वाहून रामलक्ष्मण ॥ हनुमंतें केलें उड्डाण ॥
नळ नीळ अंगद जांबुवंत पूर्ण ॥ तेही पुढें भेटलें ॥४१॥
जैसा उदय पावे आदित्य ॥ तैसा सुवेळेसी येत हनुमंत ॥
बिभीषण आणि किष्किंधानाथ ॥ सामोरे धांवती दळभारेंसी ॥४२॥
सप्रेंमें सुग्रीव बिभीषण ॥ आले हनुमंतासी देखोन ॥
म्हणती बा रे हा देह ओवाळून ॥ तुजवरून टाकावा ॥४३॥
सुग्रीव आणि बिभीषण ॥ आश्चर्य करिती दोघेजण ॥
म्हणती धन्य धन्य वायुनंदन ॥ भरिलें त्रिभुवन प्रतापें ॥४४॥
जाहला एकचि जयजकार ॥ सर्वांसी भेटला रघुवीर ॥
हनुमंताचा प्रताप समग्र ॥ राजीवनेत्र स्वयें वर्णीं ॥४५॥
या ब्रह्मांडमंडपांत ॥ मारुतिऐसा नाही भक्त ॥
याचे प्रतापें आम्ही समस्त ॥ वानर धन्य जाहलों ॥४६॥
ब्रह्मांनंद म्हणे श्रीधर ॥ अग्निपुराणीं हे कथा सुंदर ॥
बोलिला सत्यवतीकुमर ॥ तेंचि सार कथियेलें ॥४७॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत पंडित चतुर ॥ एकत्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२४८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय बत्तिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भक्तवल्लभ त्रिभुवनेश्वर ॥ सुवेळाचळीं रणरंगधीर ॥
जैसा निरभ्र नभीं पूर्णचंद्र ॥ तैसा रघुवीर शोभतसे ॥१॥
रावणासी कळला समाचार ॥ करूनि अहिमहींचा संहार ॥
सुवेळेसी आला रघुवीर ॥ गर्जती वानर जयजयकारें ॥२॥
रावण परम चिंताक्रांत ॥ हृदयीं आठवला इंद्रजित ॥
तळमळ वाटे मनांत ॥ म्हणे काय व्यर्थ वांचोनि ॥३॥
दीपेंविण जैसें सदन ॥ कीं नासिकाविण वदन ॥
कीं बुबुळाविण नयन ॥ व्यर्थ जैसे न शोभती ॥४॥
इंद्रजिताविण लंका ॥ तैसी शून्य दिसे देखा ॥
ऐसें बोलतां राक्षसनायका ॥ आवेश बहुत चढियेला ॥५॥
म्हणे लंकेमाजी दळ ॥ अवघें सिद्ध करा सकळ ॥
ऐसी आज्ञा होतां प्रबळ ॥ रणतुरें वाजों लागली ॥६॥
सवें निघाले उरले प्रधान ॥ जैसा भगणीं वेष्टिला रोहिणीरमण ॥
चतुरंगदळेंसी रावण ॥ लंकेबाहेर निघाला ॥७॥
पादातिदळ अश्व रथ ॥ यांचें कोण करील गणित ॥
पर्वतासमान गज अद्‌भुत ॥ कोट्यानुकोटी चालिले ॥८॥
सहस्र सूर्यांचे तेज लोपत ॥ तैसा रावणाचा मुख्य रथ ॥
त्यावरी शस्त्रास्त्रमंडित ॥ लंकानाथ बैसला ॥९॥
रणासी आला दशकंधर ॥ देखतां क्रोधावले वानर ॥
घेऊन शिळा तरुवर ॥ हांका देत धांविन्नले ॥१०॥
रावणें चापासि लावूनियां गुण ॥ करिता जाहला घोर संधान ॥
वानरीं अरिसैन्यावरी पर्जन्य ॥ पर्वतांचा पाडिला ॥११॥
असंख्यात सोडिले बाण ॥ तितुकेही पर्वत फोडून ॥
यवपिष्टवत करून ॥ सैन्याबाहेर पाडिले ॥१२॥
चपळेहून बाण तीक्ष्ण ॥ दशमुखें सोडिले दारुण ॥
सोडोनि संग्रामाचें ठाण ॥ वानरगण माघारले ॥१३॥
ऐसें देखोनि रणरंगधीर ॥ अयोध्यानाथ प्रचंड वीर ॥
कोदंड चढवून सत्वर ॥ लाविला शर ते काळीं ॥१४॥
अग्नीसीं झगटला कर्पूर ॥ मग उगा न राहे वैश्वानर ॥
वृषभ येता व्याघ्र ॥ सहसा स्थिर न राहे ॥१५॥
तैसा प्रतापार्क रघुनंदन ॥ विषकंठवंद्य जगन्मोहन ॥
दशकंठासी लक्षून ॥ सोडिले बाण ते काळीं ॥१६॥
असंभाव्य रामाचे बाण ॥ सुटले अमोघ चापापासून ॥
जैसे चतुराचे मुखांतून ॥ अपार शब्द निघती पैं ॥१७॥
कीं मेघाहून अवधारा ॥ अपार पडती तोयधारा ॥
किंवा ओंकारापासूनि अपारा ॥ ध्वनि जैसे उमटती ॥१८॥
कीं मूळमायेपासूनि एकसरें ॥ असंख्य जीवसृष्टि उभारे ॥
तैसें एका बाणापासूनि त्वरें ॥ असंख्य शर निघती पैं ॥१९॥
सुटतां अद्‌भुत प्रभंजन ॥ जलदजाल जाय वितळोन ॥
तैसे राक्षस छिन्नभिन्न ॥ बहुत जाहले ते काळीं ॥२०॥
ऐसें देखतां दशकंधरें ॥ प्रेरिलीं तेव्हां असंख्य शस्त्रें ॥
परी तितुकींही राजीवनेत्रें ॥ हेळामात्रें निवारिलीं ॥२१॥
जें जें शस्त्र टाकी दशकंधर ॥ त्याहूनि विशेष रघुवीर ॥
जैसा प्रवृत्तिशास्त्रींचा विचार ॥ वेदांती उडवी एकाच शब्दें ॥२२॥
कीं लहरियां समवेत सरितापती ॥ एकदांच प्राशी अगस्ती ॥
कीं तिमिरजाळाची वस्ती ॥ उगवतां गभस्ति जेवीं नुरे ॥२३॥
जैसा मेघ वर्षतां अपार ॥ वणवा विझूनि जाय समग्र ॥
तैसें रामापुढें न चले शस्त्र ॥ दशकंधर तटस्थ पाहे ॥२४॥
भूतें चेष्टा बहुत करिती ॥ परी कृतांतासीं न चलती ॥
कीं सुटतां मारुतगती ॥ मेघपडळ केवीं बाधे ॥२५॥
ऐसें देखोनि रावण ॥ कोपारूढ जाहला दारुण ॥
विचारूनि काढिले पांच बाण ॥ कीं ते पंचबाण कृतांताचे ॥२६॥
कीं पंचाग्नींचीं स्वरूपें तत्वतां ॥ किंवा पांच काढिल्या विद्युल्लता ॥
लक्षोनियां जनकजामाता ॥ सोडिता जाहला रावण ॥२७॥
राघवें योजिलें निवारण ॥ तों अकस्मात आले पंचबाण ॥
सच्चिदानंदतनु भेदोन ॥ पलीकडे रूतले ॥२८॥
पंचशर भेदोनि गेले ॥ परी रामाचें वज्रठाण न चळे ॥
जैसा पंचबाणांचेनि मेळें ॥ मारुति न ढळे कल्पांतीं ॥२९॥
हाणितां कुठार तीक्ष्ण ॥ वृक्ष न जाय सोडोनि स्थान ॥
कीं वर्षतां अपार धन ॥ अचळ बैसका सोडीना ॥३०॥
निंदक निंदिती अपार ॥ न ढळे साधूचें अंतर ॥
कीं प्रल्हादासी लावितां विखार ॥ परी तो धीर सोडीना ॥३१॥
तैसें रामठाण अति गंभीर ॥ चळलें नाहीं अणुमात्र ॥
रामासी भेदले पांच शर ॥ म्हणोनि रावण तोषला ॥३२॥
यावरी राजाधिराज रघुनाथ ॥ परम चतुर रणपंडित ॥
चापासी बाण लावूनि सप्त ॥ दशकंठावरी सोडिले ॥३३॥
दशमुखाचें हृदय फोडून ॥ पलीकडे लंकेसी गेले सप्त बाण ॥
त्या व्यथेनें रावण ॥ मूर्च्छा येऊन पडों पाहें ॥३४॥
राघवतनु परम सुकुमार ॥ भेदोनि गेले पंच शर ॥
तें देखोनि सौमित्र ॥ स्नेहेंकरून उचंबळला ॥३५॥
पाठींसी घालूनि रघुनंदन ॥ सौमित्र मांडोनि वज्रठाण ॥
सोडोनि अर्धचंद्रबाण ॥ सारथि मारिला रावणाचा ॥३६॥
आणिक सोडिले दश बाण ॥ दाही धनुष्यें पाडिलीं छेदून ॥
तों पुढें धांवोनि बिभीषण ॥ अष्ट बाण सोडिले ॥३७॥
रावणरथींचे अष्ट तुरंग ॥ बिभीषणें मारिले सवेंग ॥
सवेंचि एक बाणें अव्यंग ॥ ध्वजही खालीं पाडिला ॥३८॥
दुसरा आणोनि स्यंदन ॥ त्यावर बैसला रावण ॥
क्षोभला जैसा प्रळयाग्न ॥ तप्त पूर्ण तेवीं जाहला ॥३९॥
मग ब्रह्मशक्ति परम दारुण ॥ बिभीषणावरी प्रेरी दशानन ॥
अनिवार शक्ति जाणून ॥ लक्ष्मण पुढें जाहला ॥४०॥
जैसें पडतां दारुण ॥ पुढें होय करींचें वोडण ॥
तैसा तो ऊर्मिलाजीवन ॥ बिभीषणापुढें जाहला ॥४१॥
शक्ति येत जैसी सौदामिनी ॥ राघवानुजें बाण सोडोनी ॥
गगनीं भाग त्रय करूनी ॥ असुरवाहिनीवरी पाडिली ॥४२॥
जैसा अविधीनें जपता मंत्र ॥ होय जेवीं आपला संहार ॥
तैसी शक्ति पडतां असुर ॥ दग्ध बहुत जाहले ॥४३॥
शक्ति व्यर्थ गेली जाणोन ॥ बिभीषणासी बोले रावण ॥
सौमित्राचे पाठीसीं दडोन ॥ कां रे संग्राम करितोसी ॥४४॥
रामासी भेटोनि मूर्खा ॥ संकट भेदावया देखा ॥
दीन वचनें बोलिलासी नेटका ॥ प्राण आपुला रक्षिला ॥४५॥
आम्ही राक्षस मृगनायक ॥ आम्हांत जन्मलासी तूं जंबुक ॥
कुळाभिमान सांडूनि देख ॥ शरण गेलासी शत्रूतें ॥४६॥
आम्ही पाळिलें तुज इतुके दिन ॥ जैसें भस्मांत घातले अवदान ॥
किंवा प्रेत शृंगारून ॥ व्यर्थ जैसें मिनविलें ॥४७॥
कीं नारी सुंदर पद्मिण ॥ षंढासी दिधली नेऊन ॥
तैसें तुझें पाळण ॥ व्यर्थ आम्हीं केले रे ॥४८॥
अरे बिभीषणा शतमूर्खा ॥ वैरियाचा जाहलासी सखा ॥
दीनवचन बोलोनि कीटका ॥ कुळक्षय केला रे ॥४९॥
बिभीषण म्हणे रे बुद्धिहीना ॥ दशग्रीवा कपटिया मलिना ॥
मी शरण आलों रघुनंदना ॥ जन्ममरणातीत जाहलों ॥५०॥
मी तुज सांगितलें हित ॥ परी तूं नायकसी उन्मत्त ॥
कुळक्षय जाहला समस्त ॥ तुजही रघुनाथ वधील पैं ॥५१॥
ऐसें बिभीषण बोलत ॥ रावण जाहला क्रोधयुक्त ॥
करकरां खाऊनि दांत ॥ श्वासोच्छ्वास टाकीतसे ॥५२॥
तुज राखीतसे सौमित्र ॥ तरी त्यासी करीन चूर ॥
माझा इंद्रजित विजयी पुत्र ॥ येणेंचि गिळिला निकुंभिले ॥५३॥
अतिकायाऐसें निधान ॥ येणेंचि गिळिलें न लागतां क्षण ॥
तरी या सौमित्राचा आजि प्राण ॥ समरांगणीं घेईन मी ॥५४॥
ऐसें बोलोनि लंकापति ॥ धगधगित काढिली शक्ती ॥
गवसणी काढितांचि जगतीं ॥ तेज अद्‌भुत पसरलें ॥५५॥
कीं प्रळायाग्नीची शिखा प्रबळ ॥ किंवा कृतांतजिव्हा तेजाळ ॥
कीं ती प्रळयमेघांतील ॥ मुख्य चपळा निवडीली ॥५७॥
कीं सप्तकोटि -मंत्रतेज पाहीं ॥ एकवटलें शक्तीचें ठायीं ॥
ते मयें दशग्रीव जांवई ॥ म्हणोनि उचित दीधली ॥५८॥
ते मयशक्ति काढून पाहीं ॥ कधी कोणावर घातली नाहीं ॥
ते सौमित्रावरी ते समयीं ॥ रावण प्रेरिता जाहला ॥५९॥
न्यासासहित जपोनि मंत्र ॥ सोडोनी दिधली सत्वर ॥
नवखंडधरित्री अंबर ॥ तडाडलें ते काळीं ॥६०॥
सहस्र विजा कडकडती ॥ तैसी अनिवार धांवे शक्ति ॥
भयें व्यापिला सरितापति ॥ आंग टाकों पाहती दिग्गज ॥६१॥
देव विमानें पळविती ॥ गिरिकंदरीं वानर दडती ॥
एक मूर्च्छा येऊनि पडती ॥ न उठती मागुती ॥६२॥
दोनी दळें भयातुर ॥ पळों लागले महावीर ॥
तों ब्रह्मांडासी देणार धीर ॥ रुद्रावतार धांविन्नला ॥६३॥
मारुती बळिया जगजेठी ॥ तेणें धरिली वाममुष्टी ॥
मोडावी तों उठाउठीं ॥ दिव्य स्त्रीरूप जाहली ॥६४॥
मग ते म्हणे मारुतीसी ॥ ब्रह्मचारी तूं म्हणविसी ॥
परस्त्रियेसीं कां झोंबसी ॥ सोडी वेगेसी जाऊं दे ॥६५॥
मी रावणकन्या साचार ॥ आजि वरीन सौमित्र वीर ॥
सोडीं जाऊंदे सत्वर ॥ मुहूर्तवेळा जातसे ॥६६॥
मारुति योगी इंद्रयजित ॥ स्त्री म्हणोनि सोडिली अकस्मात ॥
तंव ती जाहली पूर्ववत ॥ प्रळय करीत चालली ॥६७॥
वानरदळीं मांडला आकांत ॥ देव जाहले भयभीत ॥
म्हणती मयशक्ति अद्‌भुत ॥ कोणावरी पडेल हे ॥६८॥
तंव लक्ष्मण लक्षित ॥ मनोवेगें शक्ति येत ॥
ते छेदावया सुमित्रासुत ॥ बाण आकर्ण ओढीतसे ॥६९॥
जैसी चपळा ये कडकडोनी ॥ तैसी हृदयीं बैसे येउनी ॥
वक्षस्थळ चूर्ण करूनी ॥ जाय निघूनि पृष्ठिद्वारें ॥७०॥
पृथ्वी फोडूनि शक्ति गेली ॥ पाताळोदकीं ते विझाली ॥
असो सौमित्राची तनु पडली ॥ भूमीवरी निचेष्टित ॥७१॥
मृत्तिकाघट जेवीं होय चूर्ण ॥ फणस पडे पवनें विदारून ॥
तैसा सुमित्रानंदन ॥ छिन्नभिन्न जाहला ॥७२॥
मग एकचि जाहला हाहाकार ॥ देव गजबजले समग्र ॥
रणीं पडला सौमित्र ॥ वानरदळ शोकर करी ॥७३॥
तंव हांक फोडी बिभीषण ॥ गजबजले सुग्रीव रघुनंदन ॥
सौमित्राजवळी धांवोन ॥ येते जाहले ते काळीं ॥७४॥
अंगद नळ नीळ जांबुवंत ॥ सुषेण शरभ गवय हनुमंत ॥
धांविन्नले वानर समस्त ॥ हृदय पिटीत ते काळीं ॥७५॥
एकचि वर्तला आकांत ॥ मिळाले सौमित्रा वेष्टित ॥
निकट बैसोनि रघुनाथ ॥ पाहता जाहला ते काळीं ॥७६॥
तो हृदय विदारिलें अत्यंत ॥ पृष्ठिद्वारें वाहे रक्त ॥
नासिकासी जों लाविला हस्त ॥ तों श्वासोछ्वास राहिला ॥७७॥
आरक्त जाहले हस्त नयन ॥ बाण तैसाचि ओडिला आकर्ण ॥
कानाडीसहित लक्ष्मण ॥ निचेष्टित पडिलासे ॥७८॥
प्राण न दिसे अणुमात्र ॥ ऐसें देखोनि राजीवनेत्र ॥
वक्षःस्थळ पिटोनि शरीर ॥ भूमीवरी टाकिलें ॥७९॥
सवें बिभीषणें सांवरून ॥ बैसविला सीतारमण ॥
सौमित्रा मांडीवरी घेऊन ॥ राम बैसला ते काळीं ॥८०॥
मुखावरी ठेवून मुख ॥ शोक करी अयोध्यानायक ॥
म्हणे प्राणसखया गोष्ट एक ॥ मजसी बोलें एकदां ॥८१॥
बारे नेत्र उघडून ॥ पाहें मजकडे विलोकून ॥
तूं सुकुमार बाळ पूर्ण ॥ भरिलें त्रिभुवन प्रतापें ॥८२॥
चतुर्दश वर्षे वनवासी ॥ बारे फळें पुरविली आम्हांसी ॥
म्यां मारिलें उपवासी ॥ एक दिवशीं पुसिलें नाहीं ॥८३॥
तोचि राग धरूनि मनी ॥ सखया जातोसी रुसोनी ॥
मी आपुला प्राण त्यजूनी ॥ येईन तुजसमागमें ॥८४॥
मी अयोध्येसी जातां जाण ॥ सुत्रित्रा पुसेल मजलागून ॥
तीतें काय सांगो वचन ॥ नेत्र उघडून पाहें पां ॥८५॥
त्रिभुवन जिंकिलें इंद्रजितें ॥ जो नावरे कोणातें ॥
तो रावणी तुवां शरपंथें ॥ जर्जर करूनि मारिला ॥८६॥
तुज देव चिंतिती कल्याण ॥ आजि समरीं केलें शयन ॥
तुजलागीं भरत शत्रुघ्न ॥ त्यजितील प्राण सौमित्रा ॥८७॥
ऐसा शोक करितां रघुवीर ॥ जाहला एकचि हाहाकार ॥
तंव तो रावणानुज ॥ भक्त थोर ॥ बोलता जाहला ते काळीं ॥८८॥
शत्रु समोर उभा रणीं ॥ शोक करितां जी ये क्षणीं ॥
हा क्षात्रधर्म चापपाणी ॥ सहसा नव्हे विचारिजे ॥८९॥
वैरी उभा असे समोर ॥ त्यासी पराभवावा सत्वर ॥
मग सौमित्राचा विचार ॥ कळेल तैसा करावा ॥९०॥
नरवीरश्रेष्ठा रघुनंदना ॥ सर्वथा भय नाहीं लक्ष्मणा ॥
शरधारीं छेदी रावणा ॥ म्हणोनि चापबाण दिधले ॥९१॥
उभा राहिला रणरंगधीर ॥ जो राक्षसकुळवैश्वानर ॥
कीं ग्रासावया ब्रह्मांड समग्र ॥ कृतांत क्षोभला कल्पांती ॥९२॥
चाप टणत्कारिलें ते वेळीं ॥ झणत्कारिल्यां घंटा सकळी ॥
उर्वीसह शेष डळमळी ॥ गजबजलीं सप्त पाताळें ॥९३॥
क्रोध श्रीरामाचा देखोन ॥ गज सिंह शार्दूल भूतगण ॥
गतप्राण बहुत होऊन ॥ काननामाजी पडियेले ॥९४॥
दशरथींचें हृदयांत ॥ क्रोधसागर हेलावत ॥
वज्रठाण मांडी रघुनाथ ॥ जें कृतांत पाहूं न शके ॥९५॥
रावणासी म्हणे रघुनंदन ॥ सौमित्रावरी शक्ति टाकून ॥
कोठें जासी तूं पळून ॥ करीन चूर्ण बाणघातें ॥९६॥
सौमित्र पडिला म्हणवून ॥ संतोषें दशमुख वारण ॥
त्यावरी रामपंचानन ॥ सरसावोनि धांविन्नला ॥९७॥
भातां शर भरले सबळ ॥ जैसें शेषमुखीं हाळाहळ ॥
कीं समुद्रामाजी वडवानळ ॥ मेघीं चपळा जयापरी ॥९८॥
ते शर सोडीत रघुपती ॥ एका शराचे कोटी होती ॥
तटतटां तुटोनि पडती ॥ राक्षसशिरें ते काळीं ॥९९॥
बिळीं निघतां विखार ॥ तैसें रावणासी रुपती शर ॥
कीं पिच्छें पसरी मयूर ॥ कीं तृणांकुर पर्वतीं ॥१००॥
कनकफळावरी कंटक स्पष्ट ॥ तैसें शर रुतले सघट ॥
रावणही सोडी शर तिखट ॥ परी निष्फळ होती ते ॥१॥
मातेचियां कैवारें ॥ क्षत्रिय संहारिलें फरशधरें ॥
तैसा सौमित्र पडतां रघुवीरें ॥ असुरदळ तेव्हां संहारिलें ॥२॥
उरग संहारिले वैनतें ॥ कीं शंकरें जाळिलें त्रिपुरातें ॥
कीं प्रळयाग्नीनें सृष्टीतें ॥ कल्पांतकाळीं जाळिलें ॥३॥
कीं तारकासुराचें दळ । षडाननें मारिलें सकळ ॥
कीं मार्तंडें तिमिरजाळ ॥ विध्वंसोनि टाकिलें ॥४॥
कीं शक्रें केले नग चूर ॥ कीं ज्ञारें हरे भवभय समग्र ॥
कीं नामे पापसंहार ॥ जैसा होय एकदांचि ॥५॥
तैसी प्रतापार्कें रघुनंदनें ॥ विध्वंसिली अरितारागणें ॥
जेवीं प्रयागीं एका स्नानें ॥ कोटि जन्मांची पापें जळती ॥६॥
प्रभंजन राम तमालनीळ ॥ विदारिलें रिपुजलदजाल ॥
तेव्हां किती पडलें राक्षसदळ ॥ गणित केलें वाल्मीकें ॥७॥
दाहा सहस्र वारण उन्मत्त ॥ नियुत तुरंग स्वारांसहित ॥
पन्नास सहस्र महारथ ॥ रथियांसहित पडियेले ॥८॥
शतकोटी पायदळ ॥ तेव्हां एक कबंध उठे सबळ ॥
ऐसीं कोटी कबंधें विशाळ ॥ तेव्हां नाचती रणांगणीं ॥९॥
तेव्हां रामधनुष्याची किंकिणी ॥ एकदां वाजे तये क्षणीं ॥
चौदाही घंटा रणांगणी ॥ वाजो लागल्या तेधवां ॥११०॥
एक अर्धयामपर्यंत ॥ घंटा घणाघणां वाजत ॥
तेव्हां राक्षस पडले अगणित ॥ शेषातेंही न गणवे ॥११॥
वेदांतशास्त्र गर्जे प्रचंड ॥ तैसे झणत्कारें रामकोदंड ॥
पाखंडी तर्क घेती वितंड ॥ रावणचाप तेवीं वाजे ॥१२॥
जैसे सन्मार्गी वर्तती संत ॥ तैसे श्रीरामाचे बाण जात ॥
वाल्मीक कोळी अभक्त ॥ तैसे शर येती रावणाचे ॥१३॥
असो रामें घालितां बाणजाळ ॥ तटस्थ जाहला राक्षसपाळ ॥
तों रामरूप सकळ ॥ दोनी दळें दिसों लागलीं ॥१४॥
कोट्यनुकोटी रघुवीर ॥ मोकलिती बाणांचे पूर ॥
दशदिशा विलोकी दशवक्र ॥ दशरथकुमर दिसती ॥१५॥
मागें पुढें सव्य वाम ॥ दिसती धनुर्धर श्रीराम ॥
राम राक्षस वानर घनश्याम ॥ स्वरूपें दिसती ते काळीं ॥१६॥
अंतरीं पाहे जों रावण ॥ तों उभा असे जगन्मोहन ॥
मन बुद्धि चित्त अंतःकरण ॥ रामरूप जाहलें ॥१७॥
दश इंद्रियें पंचप्राण ॥ पंचभूतें पंचविषय जाण ॥
चारही देह अवस्था भोगस्थान ॥ श्रीरामरूप जाहलें ॥१८॥
ऐसा राम रूप दिसे सर्वत्र ॥ रावण उघडोनि पाहे नेत्र ॥
तों रथ सारथि ध्वज चाप शर ॥ रघुवीररूप दीसती ॥१९॥
रथाजवळी रामरूप संघटलें ॥ रथावरी चढोनि आलें ॥
अंतर्बाह्य रामें व्यापिलें ॥ ठाव न दिसे पळावया ॥१२०॥
अणुरेणुपासूनि ब्रह्मपर्यंत ॥ अवघा व्यापिला रघुनाथ ॥
शस्त्र सोडोनि मयजामात ॥ रथाखालीं उडी टाकी ॥२१॥
तों रामरूप दिसे धरणी ॥ भयें ते क्षणीं ॥
मागें पाहे तों राक्षसवाहिनी ॥ धांवतचि येतसे ॥२२॥
अरे हे राम आले म्हणोन ॥ भयें हांक फोडी रावण ॥
पुढें पाहे जो विलोकून ॥ तों लंका रामरूप दिसतसे ॥२३॥
दुर्ग हुड्यांचे जे कळस ॥ त्यांवरी उभा अयोध्याधीश ॥
उडखळून पडे लंकेश ॥ उठोनि पळे मागुती ॥२४॥
असो रावण मंदिरांत ॥ पळोनि गेला पिशाचवत ॥
मंदोदरीजवळ बैसत ॥ सांगे सकळ समाचार ॥२५॥
म्हणे प्रिये म्यां पुरुषार्थ करून ॥ रणीं मारिला लक्ष्मण ॥
मग रामें व्यापिलें जनवन ॥ मी पळून येथें पातलों ॥२६॥
माझिये आंगींचें भयवारें ॥ अजूनि न जाय सुंदरे ॥
जेवीं करंड्यांतील कस्तूरी सरे ॥ परी मागें उरे मकरंद ॥२७॥
शुभाशुभ कर्में करिती ॥ मागें उरे जैसी कीर्ति ॥
कीं सायंकाळीं बुडतां गभस्ती ॥ आरक्तता मागें उरे ॥२८॥
कीं प्रचंड मारुत ओसरे ॥ परी तरुवरी हेलावा उरे ॥
कीं नदी उतरतां एकसरें ॥ मागें थारे बरटी जैसी ॥२९॥
असो असुरगुरु जो कां शुक्र ॥ तेणें मृत्युंजय मंत्र ॥
मज दिधला असे परम पवित्र ॥ करीन त्याचे अनुष्ठान ॥१३०॥
मंदोदरी म्हणे दशमुखा ॥ व्यर्थ अनुष्ठान करूं नका ॥
अद्यापि तरी मदनांतकसखा ॥ मित्र करा आपुला ॥३१॥
अथवा समरीं घालोनि कांस ॥ युद्धचि करा बहुवस ॥
परी ते न मानी लंकेश ॥ घोरकर्मास प्रवर्तला ॥३२॥
होम करावया ते काळीं ॥ भूमींत गुहा गुप्त कोरिली ॥
त्यामाजी बैसला दशमौळी ॥ सामग्री सकळ घेऊनियां ॥३३॥
कालनेमी निशाचर ॥ त्यातें अज्ञापी दशकंधर ॥
द्रोणादी आणील वायुकुमर ॥ तरी तूं सत्वर जाईं पुढें ॥३४॥
त्यातें वाटेसी विघ्न करून ॥ हिरून घेईं गिरि द्रोण ॥
अथवा हनुमंतासी मारून ॥ वाटेंत टाकीं पुरुषार्थे ॥३५॥
नाना यत्‍न करून ॥ वाटेसी गोंवा वायुनंदन ॥
निशांतीं उगवतां चंडकिरण ॥ जाईल प्राण सौमित्राचा ॥३६॥
यावरी काळनेमी निघाला तेच वेळां ॥ घेऊनि राक्षसांचा मेळा ॥
वाटेसी जाऊन बैसला ॥ विप्रवेष धरूनियां ॥३७॥
असो इकडे रघुनंदन ॥ सौमित्राजवळी येऊन ॥
टाकूनियां धनुष्य बाण ॥ शोक थोर आरंभिला ॥३८॥
तंव तो वैद्यराज सुषेण ॥ विलोकीं सौमित्राचें चिन्ह ॥
म्हणे सूर्य उगवतां प्राण ॥ निश्चयें याचा जाईल ॥३९॥
द्रोणाचळीं पीयुषवल्ली ॥ कोणी जरी आणील ये वेळीं ॥
तरी सौमित्र याच काळीं ॥ उठेल जैसा पूर्ववत ॥१४०॥
चार कोटी योजनें जाऊन ॥ रात्रीं पर्वत आणावा पूर्ण ॥
ऐसें ऐकतां रघुनंदन ॥ विलोकी सर्व कपीतें ॥४१॥
कार्य न साधे म्हणून ॥ वानर पाहती अधोवदन ॥
तटस्थ पाहे सीतारमण ॥ नेत्रीं जीवन पाझरे ॥४२॥
समय देखोनियां परम कठिण ॥ जो निर्वाणींचा सखा पूर्ण ॥
भुगर्भरत्‍नशोकहरण ॥ उभा ठाकला ते काळीं ॥४३॥
साष्टांग नमूनि जनकजामाता ॥ म्हणे त्रिभुवनपते न करावीं चिंता ॥
तृतीया प्रहर न भरतां ॥ द्रोणाचळ आणितों ॥४४॥
श्रीराम म्हणे आनंदोन ॥ सौमित्र तुझा याचक पूर्ण ॥
यासी देऊनि प्राणदान ॥ झडकरीं उठवीं स्नेहाळा ॥४५॥
ऐसेंं ऐकतां हनुमंत ॥ जयजय यशस्वी अयोध्यानाथ ॥
म्हणोनि उडाला अकस्मात ॥ उत्तरपंथ लक्षूनियां ॥४६॥
मनासी प्रार्थून तयेक्षणीं ॥ ठेवियेलें श्रीरामचरणीं ॥
जैसें प्राणमित्राचे सदनीं ॥ प्रिय ठेवणें ठेविलें ॥४७॥
सागरामाजीं मिळे लवण ॥ कीं नभी लीन होय पवन ॥
तैसें रामपदीं ठेवूनि मन ॥ वायुनंदन ॥ धांविन्नला ॥४८॥
पित्याची गति सांडून मागें ॥ हनुमंत नभीं झेपावें वेगें ॥
कीं तो उरगारि लगबगे ॥ क्षीराब्धीप्रति जातसे ॥४९॥
मस्तकीं लांगून वाहून ॥ घेत उड्डाणावरी उड्डाण ॥
जयजय रघुराज म्हणोन ॥ वारंवार स्मरण करी ॥१५०॥
एक घटिका न भरतां पूर्ण ॥ गेला सप्तद्वीपें ओलांडून ॥
तों द्रोणाचळाआलीकडे जाण ॥ मंदराचळ देखिला ॥५१॥
प्रभा त्याची चंद्रासमान ॥ कीं कैलासपीठ श्वेतवर्ण ॥
कीं तो कर्पूराचा संपूर्ण ॥ घडिला असे शीतळ ॥५२॥
कीं क्षीरसागर मंथोनि सबळ ॥ काढिला हा नवनीतगोळ ॥
कीं शोषशायी तमालनील ॥ तेणें ठेवणें ठेविलें ॥५३॥
कीं निर्दोष यश आपुलें ॥ क्षीरसिंधूनें तेथें ठेविलें ॥
कीं पृथ्वीतून नूतन उगवलें ॥ श्वेतोत्पल जयापरी ॥५४॥
असो त्या आलीकडे एक योजन ॥ कालनेमी जाहला ब्राह्मण ॥
राक्षसातें शिष्य करून ॥ आश्रम तेथें रचियेला ॥५५॥
वृक्ष अवघे सदाफळ ॥ सरोवर भरलें असे निर्मळ ॥
यज्ञशाळा तेथे विशाळ ॥ कुंड वेदिका यथाविधि ॥५६॥
यज्ञपात्रें असती बहुत ॥ कुंडाभोंवती विराजित ॥
समिधा दर्भ यथायुक्त ॥ करूनि सिद्ध ठेविले ॥५७॥
घातलें असे अन्नसत्र ॥ ऐसा तो कालनेमी निशाचर ॥
बकध्यान धरून साचार ॥ वाट पाहे मारुतीची ॥५८॥
वरिवरी शोभे वृंदावन ॥ कीं दंभिकाचें शुष्क ज्ञान ॥
कीं कासारें प्रतिमा ठेवून ॥ विकावया बैसला ॥५९॥
तो इतक्यांत वायुसुत ॥ तृषाक्रांत पातला तेथ ॥
तंव तो कपटी पुढें धांवत येत ॥ नमन करितसे कपीसी ॥१६०॥
म्हणे माझे भाग्य धन्य ॥ जाहले महापुरुषाचें दर्शन ॥
म्हणे स्वामी दया करून ॥ आजि येथें क्रमावें ॥६१॥
आजि तुमचे दर्शन दुर्लभ सत्य ॥ राहावें एक दिनापर्यंत ॥
अथवा निरंतर रहावें एथ ॥ ऐकतां हनुमंत संतोषला ॥६२॥
हनुमंत बोले रसाळ ॥ पुढें कार्य आहे बहुसाल ॥
आतां उदग द्या जी शीतळ ॥ सकळ उपचार पावले ॥६३॥
कालनेमी बहुत प्रार्थी ॥ परी कदा न राहे मारुती ॥
विटोनियां परम चित्तीं ॥ शिष्यांप्रति सांगतसे ॥६४॥
म्हणे उदक द्या रे मर्कटासी ॥ दुसरें न मागे कोणासी ॥
तों सरोवर दाविती मारुतीसी ॥ जेथें विवसी वसतसे ॥६५॥
ते विवसी परम दारुण ॥ देह तिचा पर्वतासमान ॥
करूं जातां जलप्राशन ॥बहुत जीव भक्षिले ॥६६॥
तेथें उदक घ्यावया पूर्ण ॥ बैसला अवनिजाशोकहरण ॥
तंव जळदेवता येऊन ॥ पाय धरी मारुतीचा ॥६७॥
हनुमंतें कंठीं धरून ॥ बाहेर काढिली ओढून ॥
लत्ताप्रहार हृदयी देऊन ॥ मारिली तेथें ते काळीं ॥६८॥
तिच्या शरीरातून ते वेळीं ॥ दिव्य देवांगना निघाली ॥
मारुतीचे चरणीं लागली ॥ वार्ता आपुली सांगतसे ॥६९॥
म्हणे मी स्वर्गीची देवांगना ॥ रूपाभिमानें न मानीं कोणा ॥
हांसलें मी एका तपोधना ॥ तेणें मज शापिलें ॥१७०॥
म्हणे तूं विवसी होईं पापमति ॥ मग उःशाप मागतां तयाप्रति ॥
तो म्हणे द्रोणाचळ न्यावया मारुति ॥ रातोरातीं येईल ॥७१॥
तो तुज उद्धरील निश्चिती ॥ तें आजि आली प्रचीती ॥
आणिक गोष्ट असे मारुती ॥ ती तुजप्रति सांगत्यें ॥७२॥
सहसा नव्हे हा मुनीश्वर ॥ कपटी कालनेमी असुर ॥
रावणें प्रेरिला साचार ॥ त्याचा संहार करीं तूं ॥७३॥
ऐसें मारुतीस सांगोन ॥ स्वर्गपंथें गेली उद्धरून ॥
मारुति आला परतोन ॥ कालनेमीजवळी पैं ॥७४॥
मनांत म्हणे हनुमंत ॥ हा दुरात्मा बैसला येथ ॥
याचा करावा निःपात ॥ तों कपटी बोले तेधवां ॥७५॥
म्हणे आम्हां भल्या ब्राह्मणा ॥ काय देतोसी गुरुदक्षिणा ॥
हनुमंतें मुष्टि वळोनि जाणा ॥ हृदयावरी दिधली ॥७६॥
तों पांच योजनें शरीर ॥ उभा ठाकला युद्धासी असुर ॥
कपी म्हणे आतां उशीर ॥ कासया येथें लावावा ॥७७॥
पायीं धरून आपटिला ॥ कालनेमी प्राणासी मुकला ॥
वरकड शिष्य ते वेळां ॥ पळूनि गेले लंकेसी ॥७८॥
कालनेमी आपटितां तो ध्वनि ॥ गंधर्वीं ऐकतांच श्रवणीं ॥
चौदा सहस्र धांवूनि ॥ हनुमंतावरी लोटले ॥७९॥
काग मिळोनियां बहुत ॥ धरावया धांवती आदित्य ॥
कीं मूर्ख मिळून समस्त ॥ वाचस्पतीसी जिंकू म्हणती ॥१८०॥
असो हनुमंतें तये क्षणीं ॥ गंधर्वांचा भारा बांधोनी ॥
फिरवून आपटिले मेदिनी ॥ प्रेतें करून टाकिले ॥८१॥
तेथून उडाला हनुमंत ॥ सौमित्राची मनीं चिंता बहुत ॥
द्रोणादीसमीप त्वरित ॥ त्वरेंकरून पातला ॥८२॥
जैसें बावनकसी सुवर्ण ॥ तैसा द्रोणाद्रिपर्वताचा वर्ण ॥
वरी वल्ली दैदीप्यमान ॥ तेजें गगन उजळलें ॥८३॥
दृष्टीं देखतां हनुमंत ॥ द्रोणादि जाहला भयभीत ॥
म्हणे हा मागुती आला येथ ॥ मजलागीं न्यावया ॥८४॥
कैंचा राम कैंचा रावण ॥ एकदां गेला घेऊन ॥
मागुती उभा ठाकला येऊन ॥ आयुष्यांती मृत्यु जैसा ॥८५॥
उपाधीच्या गुणें बहुत ॥ नसतीं विघ्नें दाटून येत ॥
वल्लीयोगें हा अनर्थ ॥ क्षणक्षणां होतसे ॥८६॥
असो हनुमंतें पर्वतासी नमून ॥ प्रार्थीत उभा कर जोडून ॥
म्हणे शक्तीनें भेदला लक्ष्मण ॥ आकांत पूर्ण मांडला ॥८७॥
त्रिभुवननायक रावणारी ॥ त्यावरी तूं उपकार करीं ॥
औषधी दे झडकरी ॥ अथवा तेथवरी तूं चाल ॥८८॥
संतोषेल अयोध्याधीश ॥ त्रिभुवनीं वाढेल तुझें यश ॥
बोलतां आतां विशेष ॥ उशीर कार्या होतसे ॥८९॥
द्रोण म्हणे मर्कटा पामरा ॥ कां करिसी घडीघडी येरझारा ॥
औषधी नेदीं वानरा ॥ मी तंव तेथें न येचि ॥१९०॥
हनुमंत म्हणे रे गिरी द्रोणा ॥ निर्दया खळा महा मलिना ॥
तुज क्षणांत बुद्धिहीना ॥ उचलोनि नेईन लंकेसी ॥९१॥
पुच्छ पसरोनि ते वेळे ॥ पर्वतातें तीन वेढे घातले ॥
उपडोनियां निजबळें ॥ तोलोनि हातीं घेतला ॥९२॥
अंतरिक्ष जातां हनुमंत ॥ चंद्र पाहे चकित ॥
म्हणे काय हें अद्‌भुत ॥ आकाशमार्गें जात असे ॥९३॥
तों नंदिग्रामीं भरतें जाण ॥ देखिलें परम दुष्ट स्वप्न ॥
एक काळपुरुष येऊन ॥ दक्षिणबाहु गिळियेला ॥९४॥
गजबजोनी उठिला भरत ॥ म्हणे विपरीत जाहला दृष्टांत ॥
क्षेम असो रघुनाथ ॥ सीतासौमित्रासहित पैं ॥९५॥
गुरु म्हणे दुष्ट स्वप्न ॥ करावें शांतिक हवन ॥
तत्काळ होमद्रव्यें आणून ॥ कैकयीनंदन हवन करी ॥९६॥
आहुती टाकी जों भरत ॥ तों अंतरिक्ष जात हनुमंत ॥
केवळ अग्निकल्होळ पर्वत ॥ पडेल वाटे खालता ॥९७॥
वसिष्ठ जाहला भयभीत ॥ त्यास धीर देत भरत ॥
म्हणे हें अनिष्ट अकस्मात ॥ विंधोनि पाडितों एकीकडे ॥९८॥
तुम्ही स्वस्थ असावें समस्तीं ॥ कीजे हवनाची पूर्णाहुती ॥
ऐसें बोलून त्वरितगती ॥ चाप भरतें चढविलें ॥९९॥
ज्याचे बाण सतेज बहुत ॥ रामनामबीजांकित ॥
आकर्ण ओढूनि त्वरित ॥ सोडिता जाहला तात्काळीं ॥२००॥
कडकडूनि निघे चपळा ॥ तैसा ऊर्ध्वपंथें बाण गेला ॥
पर्वतासहित बाणीं खिळिला ॥ हनुमंताचा हस्त पैं ॥१॥
महागजासी पर्वतपात ॥ तैसा भूमीवरी हनुमंत ॥
कोसळला रामस्मरण करित ॥ आरंबळत पडियेला ॥२॥
रामनामस्मरणाचा ध्वनि ऐकून ॥ धांवोनि आला कैकयीनंदन ॥
तों महापर्वत घेऊन ॥ वानर अद्‌भुत पडियेला ॥३॥
भरत प्रेमें बोले वचन ॥ सखया तूं कोणाचा कोण ॥
मज स्नेह उपजे तुज देखोन ॥ रामनाम जपतोसी ॥४॥
हाहाकार करी वायुनंदन ॥ म्हणे आतां कैसा वांचेल लक्ष्मण ॥
प्राण त्यजील रघुनंदन ॥ सूर्योदय होतांचि ॥५॥
ऐसें आक्रोशें बोले हनुमंत ॥ भूमी तनु टाकी भरत ॥
म्हणे प्राणसखया सांग यथार्थ ॥ वार्ता विपरीत बोलसी ॥६॥
तयासी पुसे हनुमंत ॥ येरू म्हणे मी रामाचा दास भरत ॥
मारुति म्हणे केला अनर्थ ॥ रावणाहूनि आगळा तूं ॥७॥
मग भरतासी वर्तमान सकळ ॥ सांगे अंजनीचा बाळ ॥
दशमुखाचे शक्तीनें विकळ ॥ वीर सौमित्र पडियेला ॥८॥
त्यासी जीववावया निश्चित ॥ नेत होतों द्रोणपर्वत ॥
तुवां विघ्न करोनि पाडिलें येथ ॥ हें तों त्यासी कळेना ॥९॥
आतां नुगवतां आदित्य ॥ तेथें कोण नेईल पर्वत ॥
वाट पाहतसे रघुनाथ ॥ श्रमेल समर्थ कृपाळु ॥२१०॥
मग बोले भरत वीर ॥ मज वाटतें तूं केवळ ईश्वर ॥
चारी कोटी योजनें दूर ॥ पर्वत घेऊनि आलासी ॥११॥
आतां न उगवतां दिनकर ॥ लंकेसी नग न्यावा सत्वर ॥
नाहीं तरी अनर्थ थोर ॥ सांगतोसी कपीश्वरा ॥१२॥
तुजसमवेत पर्वतास ॥ न भरतां एक निमेष ॥
नेऊनि ठेवीन लंकेस ॥ तरीच दास श्रीरामाचा ॥१३॥
हे जरी नव्हे माझे कृत्य ॥ तरी सूर्यवंशी जन्मोनि व्यर्थ ॥
जननी श्रमविली यथार्थ ॥ हांसेल दशरथ वैकुंठी ॥१४॥
पर्वतसहित हनुमंता ॥ बाणाग्री बैस आतां ॥
कार्मुक वोढोनी तत्वतां ॥ सुवेळेसी पाठवितों ॥१५॥
ऐसें बोलतांचि भरत ॥ मनीं आश्चर्य करी हनुमंत ॥
म्हणे होय रामबंधु यथार्थ ॥ पुरुषार्थ अद्‌भुत न वर्णवे ॥१६॥
मग हनुमंतें उठोन ॥ वंदिलें भरताचे चरण ॥
म्हणे वंश तुझा धन्य ॥ भरलें त्रिभुवन कीर्तीनें ॥१७॥
महाराज बोलिला यथार्थ ॥ परी मी रामदास हनुमंत ॥
माझें बळ आणि पुरुषार्थ ॥ श्रीरघुनाथ जाणतसे ॥१८॥
हें ब्रह्मांड उचलून ॥ कंदुकाऐसें झेलीन ॥
तुमचा रामनामांकित बाण ॥ त्यासी मान दीधला ॥१९॥
पश्चिमेस उगवेल चंडकिरण ॥ मेरु मंदार सोडिती स्थान ॥
परी रामदास्य करितां पूर्ण ॥ सामर्थ्य माझें न भंगे ॥२२०॥
आतां आज्ञा द्यावी सत्वर ॥ उदय करूं पाहे दिनकर ॥
मग बोले भरत वीर ॥ विजयी होई सर्वथा ॥२१॥
रघुपतीसी माझें साष्टांग नमन ॥ करूनि सांगें वर्तमान ॥
सौमित्रसीतेसहित आपण ॥ अयोध्येसी शीघ्र येइंजे ॥२२॥
अवश्य म्हणे हनुमंत ॥ करतळीं घेऊन पर्वत ॥
जयजय यशस्वी सीताकांत ॥ म्हणोनियां उडाला ॥२३॥
अमृतघट घेऊनियां हातीं ॥ पूर्वीं गेला खगपती ॥
तैसाचि जातसे मारुती ॥ देव पाहती विमानीं ॥२४॥
तों इकडे जानकीनाथ ॥ चिंता करीं वानरांसहित ॥
म्हणे कां न येचि हनुमंत ॥ उशीर बहुत जाहला ॥२५॥
तों उगवे जैसा आदित्य ॥ तैसा दुरोनि देखिला पर्वत ॥
रघुपतीस वानर सांगत ॥ स्वामी मित्र उदय पावला ॥२६॥
ऐसे जंव वानर बोलत ॥ तंव कोपला सीताकांत ॥
म्हणे हा कुळघातकी यथार्थ ॥ उत्तरेसी उदय पावला ॥२७॥
साहा घटिका असे रजनी ॥ आजी पूर्वदिशा सांडोनी ॥
लवकरीच कां तरणी ॥ उत्तरेसी उगवला ॥२८॥
धनुष्य चढविलें सत्वर ॥ राहुमुख काढिला शर ॥
म्हणे हा लोकआयुष्यचोर ॥ रजनीचरासी मिळाला ॥२९॥
तंव तो सुषेण वीर बोलत ॥ सूर्य नव्हे हा आला हनुमंत ॥
ऐसें बोलतां सीताकांत ॥ परम आनंदें उचंबळला ॥२३०॥
पुरुषार्थी अंजनीचा बाळ ॥ अवलीळें उचलिजे अद्‌भुत फळ ॥
तैसा घेऊनियां अचळ ॥ रामदर्शना येतसे ॥३१॥
कीं अंधकार पडिला सघन ॥ रावण पळाला जीव घेऊन ॥
यालागीं अनंत दीपिका उफाळून ॥ शोधूं आला हनुमंत ॥३२॥
कीं अमृतकुंभचि आणिला ॥ कीं यशाचा ध्वज उभारिला ॥
कीं सौमित्राचा प्राण परतला ॥ रुसोनि जात होता तो ॥३३॥
असो सुग्रीवादि वानर ॥ करूनियां जयजयकार ॥
वेगें धांवती समोर ॥ पर्वत खालीं उतरावया ॥३४॥
गिरि उतरतांचि हनुमंत ॥ स्वामीस लोटांगण घालित ॥
आसनींहूनि रघुनाथ ॥ पुढें धांवे उठवावया ॥३५॥
हनुमंतासी उचलोन ॥ हृदयी धरीं रघुनंदन ॥
रामें नेत्रोदकेंकरून ॥ अभिषेकिला मारुती ॥३६॥
हनुमंताचा वदनचंद्र ॥ स्वकरें कुरवाळी रघुवीर ॥
असो वैद्य सुषेण सत्वर ॥ पर्वताजवळी पातला ॥३७॥
नमस्कार करूनि पर्वत ॥ मंत्रोनि औषधीवरी टाकी अक्षत ॥
चारी वल्ली घेऊनि त्वरित ॥ एकांतीं रस काढिला ॥३८॥
हर्षभरित सुषेण ॥ चारी रसपात्रें भरून ॥
लक्ष्मणापासीं धांवोन ॥ येता जाहला ते काळीं ॥३९॥
संजीवनीचा रस काढिला ॥ तो आधीं मुखीं ओतिला ॥
घायामाजी ते वेळां ॥ संधिनीरस घालित ॥२४०॥
विशल्या लावितां जाण ॥ कोठें न दिसे घायव्रण ॥
सुवर्णकांति संपूर्ण ॥ दिव्यदेह जाहला ॥४१॥
निजेला उठे अकस्मात ॥ तैसा उभा ठेला सुमित्रासुत ॥
बाण तैसा आकर्णपर्यंत ॥ घे घे म्हणोनि धांविन्नला ॥४२॥
पुसे कोठें आहे रावण ॥ त्यासी बाणें करीन चूर्ण ॥
तों रघुनाथें करी धरून ॥ लक्ष्मणासी आलिंगिलें ॥४३॥
जाहला एकचि जयजयकार ॥ देव वर्षती पुष्पसंभार ॥
मग सुषेणें उरले वानर ॥ तेही उठविले ते काळीं ॥४४॥
सागर उद्धरावया भागीरथी ॥ भगीरथें आणिली ये क्षितीं ॥
परी असंख्य जीव उद्धरती ॥ बिंदुमात्र झगटतां ॥४५॥
चक्रवाकालागीं रवि धांवत ॥ परी सर्वांवरी प्रकाश पडत ॥
कीं चकोरासी शशी पावत ॥ रसभरित औषधी होती ॥४६॥
चातकांलागीं मेघ वर्षती ॥ परी आर्द्र होय सर्व जगती ॥
कीं वराचिया पंक्तीं ॥ वर्‍हाडी होती तृप्त जैसे ॥४७॥
तैसें सौमित्राकारणें सत्वर ॥ औषधी आणी वायुकुमर ॥
तेणेंच असंख्य वानर ॥ सजीव केले ते काळीं ॥४८॥
मारुतीचें यशवैभव ॥ क्षणक्षणां वर्णीत राघव ॥
विमानीं इंद्रादि देव ॥ कीर्ति गाती मारुतीची ॥४९॥
असो पर्वत उचलूनि ते वेळां ॥ मारुती माघारा चालिला ॥
दशमुखासी समाचार कळला ॥ सौमित्र उठिला म्हणोनि ॥२५०॥
शत राक्षस निवडून ॥ तयांप्रति सांगे रावण ॥
म्हणे हिरोन घ्यारे गिरि द्रोण ॥ मारुतीसी आडवोनियां ॥५१॥
असुर पाठीं लागती ॥ वानरा पर्वत टाकीं म्हणती ॥
पर्वत धरूनि एके हातीं ॥ परते मारुती तयांवरी ॥५२॥
करचरणघातेंकरून ॥ शतही टाकिले मारून ॥
स्वस्थळी ठेवूनि गिरि द्रोण ॥ सुवेळेसी पातला ॥५३॥
तों उगवेल सूर्यकुळ ॥ भूषणाचें चरणकमळ ॥
हनुमंतें वंदोनि तात्काळ ॥ कर जोडून उभा ठाके ॥५४॥
मग नंदिग्रामींचें वर्तमान ॥ रघुपतीसी सांगे वायुनंदन ॥
भरतें सोडूनि दिव्य बाण ॥ द्रोणाचळ पाडिला होता ॥५५॥
मी क्षणभरी पाहिला अंत ॥ तरी परम प्रतापी वीर भरत ॥
मजसमवेत पर्वत ॥ बाणाग्रीं स्थापित होता पैं ॥५६॥
ऐसें बोलतां मारुती ॥ आश्चर्य करिती सकळ जुत्पती ॥
सद्रद होऊनि रघुपती ॥ बोलता जाहला प्रीतीनें ॥५७॥
म्हणे आतां रावण वधोनियां ॥ जाईन भरतासी भेटावया ॥
हनुमंतें चरण वंदोनियां ॥ राघवाप्रति बोलत ॥५८॥
स्वामी निःसीम भरताचें भजन ॥ सप्रेम वैराग्य अद्‌भुत ज्ञान ॥
चकोर इच्छी रोहिणीरमण ॥ तैसी वाट पाहतसे ॥५९॥
कीं वनास धेनु गेली दूरी ॥ तान्हें वत्स वाट पाहे घरीं ॥
कीं ऊर्ध्वमुखें निर्धांरीं ॥ चातक इच्छी घनबिंदु ॥२६०॥
सर्व मंगलभोग करूनि दूरी ॥ भरत वाट पाहे अहोरात्रीं ॥
ऐसें मारुती बोलतां अंतरीं ॥ आत्माराम संतोषला ॥६१॥
रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हा कल्पवृक्ष उदार ॥
दृष्टांत फळीं समग्र ॥ लावोनि आला पडिभरें ॥६२॥
श्रीधरवरदा आदिपुरुषा ॥ श्रीमद्‌भीमातटविलासा ॥
ब्रह्मानंदा पंढरीशा ॥ अभंग भजन देईं तुझें ॥६३॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वात्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२६४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय तेहतिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जानकीनेत्रसरोजमित्रा ॥ मित्रकुळभूषण स्कंदतातमित्रा ॥
मित्रकुळकैवारिया भूसुरमित्रा ॥ सौमित्राग्रजा श्रीरामा ॥१॥
भक्तमानसचकोरचंद्रा ॥ त्रिविधतापशमना आनंदसमुद्रा ॥
भरतहृदयारविंदभ्रमरा ॥ भवभयहरा राजीवाक्षा ॥२॥
मुमुक्षचातकनवमेघरंगा ॥ सकळरंगातीत अनंगा ॥
आनंदमय अमला निःसंगा ॥ अक्षय अभंगा निरुपाधिका ॥३॥
रणरंगधीरा रघुनंदना ॥ बोलवी पुढें ग्रंथंरचना ॥
हनुमंते द्रोणादि आणूनि जाणा ॥ सौमित्राप्राणा वांचविलें ॥४॥
यावरी बोले बिभीषण ॥ बाहेर युद्धा न ये रावण ॥
शक्रजिता ऐसें हवन ॥ गुप्त तेणें मांडिले ॥५॥
सुटले आहुतींचे परिमळ ॥ धुमे्रं कोंदलें नभमंडळ ॥
अग्नींतून रथ तेजाळ ॥ अर्धा बाहेर निघाला ॥६॥
पूर्णाहुति होतां पूर्ण ॥ संपूर्ण निघेल स्यंदन ॥
तरी अगोदरचि जाऊन ॥ विघ्न तेथें करावें ॥७॥
ऐसें बोलता बिभीषण ॥ मुख्य कपी उठिले दाहा जण ॥
नळ नीळ जांबुवंत वालिनंदन ॥ सीताशोकहरण पांचवा ॥८॥
गवय गवाक्ष गंधमादन ॥ शरभ केसरी पावकलोचन ॥
दशरथात्मजासी वंदून ॥ दाहाजण वीर उठिले ॥९॥
ते दाहाही पराक्रमेंकरून ॥ दशदिशा जिंकिती न लागतां क्षण ॥
अकस्मात उर्ध्वपंथें उडोन ॥ दशमुखावरी चालिले ॥१०॥
जैसे विहंगम उडती गगनीं ॥ तैसें लंकेंत आले तयेक्षणीं ॥
घरोघरीं रिघोनि ॥ रावणा शोधिती तेधवां ॥११॥
जे जे भेटती राक्षस ॥ त्यांती करिती ताडणास ॥
कोठें बैसला लंकेश ॥ दावा आम्हांस वेगेंसी ॥१२॥
शोधिले अवघे लंकाभुवन ॥ परी ठायीं न पडेचि रावण ॥
तों बिभीषणाची राणी येऊन ॥ दावी खुण गुप्तत्वें ॥१३॥
सरमा सांगे सत्वर ॥ नगरदुर्गाखालीं विवर ॥
त्यांत बैसला दशकंधर ॥ दुराचारी कपटिया ॥१४॥
ऐसें ऐकतां ते वेळां ॥ विवरमुखीं होती शिळा ॥
वानरीं फोडूनि मोकळा ॥ मार्ग केला ते समयीं ॥१५॥
तेथें राक्षस होते दारुण ॥ ते वधिले न लगतां क्षण ॥
आंत प्रवेशले वानरगण ॥ विवर विस्तीर्ण देखिलें ॥१६॥
तों तेथें शिवालय प्रचंड ॥ पुढें प्रज्वळिलें होमकुंड ॥
आहुति टाकी दशमुंड ॥ नेत्र वीसही झांकोनियां ॥१७॥
रक्त मद्य मांस पर्वत ॥ नरशिरें पडलीं असंख्यात ॥
रक्तें स्नान करूनि लंकानाथ ॥ वज्रासनीं बैसला ॥१८॥
आश्चर्य करिती वानरगण ॥ अजून न सांडीच हा प्रयत्‍न ॥
कुळक्षय जाहला संपूर्ण ॥ तरी जयआशा धरितसे ॥१९॥
असो वानरीं शिळा घेऊनि प्रचंड ॥ विध्वंसिलें होमकुंड ॥
सामग्री नासोनि उदंड ॥ यज्ञपात्रें फोडिली ॥२०॥
सावध नव्हेचि रावण ॥ वस्त्रें फेडूनि केला नग्न ॥
दाही मुखांमाजी संपूर्ण ॥ धुळी घालिती वानर ॥२१॥
एक वर्मस्थळी शिळा हाणिती ॥ एक वक्षःस्थळीं ताडिती ॥
तरी सावध नव्हे लंकापति ॥ नानाप्रयत्‍न केलिया ॥२२॥
मग तेथोनि उडाला वालिसुत ॥ प्रवेशला राणिवसांत ॥
मंदोदरीस उचलोनी अकस्मात ॥ रावणापाशीं आणिली ॥२३॥
परम सुंदर सुकुमार ॥ रावणावरी लोटिती वानर ॥
वीर कंचुकी अलंकार ॥ केले चूर वानरीं ॥२४॥
मदांदरी म्हणे दशवदना ॥ आग लागो तुझिया अनुष्ठाना ॥
वानरीं विटंबिली अंगना ॥ लाज कैसी नाही तूंतें ॥२५॥
ते पविव्रता करूनि नग्न ॥ रावणावरी देती ढकलून ॥
मयजा आक्रंदे दारुण ॥ ऐकतां रावण उघडी नेत्र ॥२६॥
तों मंदोदरीं आक्रंदत ॥ होम विध्वंसिला समस्त ॥
क्रोधें उठोनि लंकानाथ ॥ वानरांवरी धांवन्निला ॥२७॥
बहुत वानर ते वेळे ॥ पायीं धरूनि आपटिले ॥
अंगद मारुतीसी दिधले मुष्टिघात बहुत पैं ॥२८॥
सकळी वानर निघोन ॥ सुवेळेसी आले परतोन ॥
म्हणती उठविला रावण ॥ युद्धालागीं येईल पैं ॥२९॥
सभा मोडूनि रघुवीर ॥ कोदंड चढविलें सत्वर ॥
म्हणे मयजेचें सौभाग्य समग्र ॥ आजपासोनि खंडलें ॥३०॥
इकडे मंदोदरीचे समाधान ॥ करिता झाला रावण ॥
वस्त्रें भूषणें देऊन ॥ हृदयी दृढ धरियेली ॥३१॥
म्हणे प्राक्तनभोग दारुण ॥ प्रिये न सुटे भोगिल्याविण ॥
आतां गृहा जावें आपण ॥ समाधानें असावें ॥३२॥
आजि मी झुंजेन निर्वाण ॥ शत्रुशिरें आणीन छेदून ॥
नाहीं तरी प्रिये येथून ॥ तुमची आमची हेचि भेटी ॥३३॥
गृहा पाठविली मंदोदरी ॥ वस्त्रें भूषणे देऊन झडकरी ॥
रावण निघाला बाहेरी ॥ ठोकिल्या भेरी एकसरें ॥३४॥
राक्षसस्थळ जितकें उरलें ॥ तें अवघें सांगातें घेतले ॥
अपार रणतुरें ते वेळे ॥ वाजों लागलीं भयंकर ॥३५॥
पदातिदळ पुढें जात ॥ त्यापाठीं स्वार चौताळत ॥
त्यामागें गज उन्मत्त ॥ गुढारांसहित धांवती ॥३६॥
त्यांचे पाठीं रथ जाती ॥ रथीं बैसला लंकापती ॥
छत्रें मित्रपत्रें झळकती ॥ पुढें पढती भाट ब्रिंदें ॥३७॥
रावण रणनोवरा सत्य ॥ मुक्ति नोवरी वरू जात ॥
वऱ्हाडी पुढें गेले बहुत ॥ उरले ते सर्व घेत संगें ॥३८॥
मागें बंधु बिभीषण ॥ लंकेसी ठेविल रक्षण ॥
असो रणभूमीस रावण ॥ वायुवेगें पातला ॥३९॥
तों शिळा वृक्ष घेऊन ॥ वेगें धांवले वानरगण ॥
जैसा प्रळयांती पर्जन्य ॥ तैसा पाडिला पर्वतांचा ॥४०॥
दश धनुष्यां लावूनि बाण ॥ एकदांच सोडी रावण ॥
सर्वही पर्वत फोडून ॥ सैन्य बाहेर काढिलें ॥४१॥
प्रचंड पराक्रमी लंकानाथ ॥ शरीं वानर खिळिले समस्त ॥
ऐसें देखोनि रघुनाथ ॥ पुढें जाहला ते क्षणीं ॥४२॥
रघुनाथ म्हणे दशकंधरा ॥ मलिना शतमूर्खा पामरा ॥
सीता आणूनि तस्करा ॥ कुलक्षय केला व्यर्थचि ॥४३॥
संतति संपत्ति विद्या धन ॥ टाकिलीं वेदांची खंडें करून ॥
रासभासी चर्चिलें चंदन ॥ तैसं ज्ञान असुरा तुझें ॥४४॥
आजि समरांगणीं जाण ॥ तुज खंडविखंड करीन ॥
पुढील अवतारीं मुक्ति देईन ॥ असुरा जाण तुज निश्चयें ॥४५॥
तंव प्राणहर्तें माझे शर ॥ आले सावध होईं सत्वर ॥
यावरी दशद्वयनेत्र ॥ प्रत्युत्तर देत असे ॥४६॥
तूं म्हणविसी रामचंद्र ॥ परी मी राहु असे भयंकर ॥
आजि खग्रास करीन समग्र ॥ समरीं तुझा मानविया ॥४७॥
माझे समरीं सुटतां बाण ॥ मेरु मांदार होती चूर्ण ॥
तूं सुकुमार मानवनंदन ॥ कैसे साहसी पाहेन ते ॥४८॥
सीता सुंदर अत्यंत ॥ कष्टत होती अरण्यांत ॥
म्यां आणिली ते तुज प्राप्त ॥ पुनः न होय सर्वथा ॥४९॥
पश्चिमेस उगवेल तरणी ॥ जरी मशक उचलील धरणी ॥
गजमस्तकींचें मोतीं भिवोनी ॥ सिंह देईल जंबुका ॥५०॥
पाषाणघायेंकरून ॥ जरी दुःख पावे प्रभंजन ॥
गरुड सर्पासी येईल शरण ॥ पतंग अग्नीस गिळील जरी ॥५१॥
हेंही एक वेळ घडे ॥ परी तुज जानकी दृष्टी न पडे ॥
रावण बोलतां गडाडे ॥ मेघ जैसा आकाशीं ॥५२॥
रघूत्तम म्हणे दशकंठा ॥ तुज मृत्युसमयीं फुटला फांटा ॥
माझे बाणांचा प्रताप मोठा ॥ साहें आजि समरांगणी ॥५३॥
रामें चाप टणत्कारून प्रचंड ॥ शर सोडी जैसा काळदंड ॥
दोघे वीर परम प्रचंड ॥ रण वितंड माजविलें ॥५४॥
मांडिलें एकचि घनचक्र ॥ रणतुरें वाजती अपार ॥
सीताजननी थरथर ॥ कंपित होय क्षणाक्षणां ॥५५॥
अलातचक्रें जेवी फिरती ॥ तेवीं उभयचापें झळकती ॥
चपळेऐशा तळपती ॥ मुद्रिका हातीं दोघांचे ॥५६॥
भुजंगअस्त्राचा प्रयोग ॥ रावण करी तेव्हां सवेग ॥
दशदिशा फुटोनि पन्नग ॥ कपिकटकावरी येती ॥५७॥
जैसें निबिड जलदजाल ॥ तैसा सर्पीं व्यापिलें सकळ ॥
ऐसें देखोनि तमालनीळ ॥ गरुडास्त्र बाण योजिला ॥५८॥
सोडितां सुपर्णास्त्र बाण ॥ पृथ्वी आणि आकाश फोडून ॥
असंख्य धांवती विनतानंदन ॥ सर्प संपूर्ण भक्षिले ॥५९॥
सर्प संहारून मस्तक ॥ गरुड सवेंचि जाहले गुप्त ॥
जातवेदास्त्र दैदीप्य ॥ विंशतिनेत्रें सोडिले ॥६०॥
पाखंड उच्छेदी पंडित ॥ तेवीं जलदास्त्र प्रेरी रघुनाथ ॥
रावणें वातास्त्र अद्‌भुत ॥ तयापरी प्रेरिलें ॥६१॥
रामें आड घालून पर्वत ॥ प्रभंजन कोंडिला समस्त ॥
वज्रास्त्र प्रेरी लंकानाथ ॥ फोडिले पर्वत तात्काळीं ॥६२॥
मग असंभाव्य शस्त्रजाळ ॥ रावणें प्रेरिलें तत्काळ ॥
एकचि बाण अयोध्यापाळ ॥ छेदोनियां टाकीतसे ॥६३॥
रावणें योजिला एक शर ॥ दिनकरमुख तेज अपार ॥
तो चापीं योजोनि सत्वर ॥ राघवावरी सोडिला ॥६४॥
रघुत्तमें केलें संधान ॥ परी तो अनिवार शर पूर्ण ॥
श्रीरामचरणांतें लागला येऊन ॥ भेदून गेला पलीकडे ॥६५॥
राघवचरण सुकुमार ॥ वामपाद फोडूनि गेला शर ॥
ऐसें देखोनि वानर वीर ॥ उठिले सर्व एकदांचि ॥६६॥
रणीं पडली होती शस्त्रें ॥ ती वानरी घेतलीं अपारें ॥
मारीत उठिले एकसरें ॥ अनिवार काळासी जे ॥६७॥
परमार्थबळेंकरूनि सबळ ॥ ज्ञानी विध्वंसिती प्रपंचदळ ॥
तैसे रामउपासक निर्मळ ॥ असुर सकळ रगडिती ॥६८॥
अभिमानाचे मुकुट थोर ॥ परमार्थबाणें केले चूर ॥
त्रयावस्थांची कवचें अपार ॥ सूर्यखङ्गे तोडिली ॥६९॥
समवृत्तीचीं शस्त्रें घेऊन ॥ द्वेषधनुष्यें छेदिलीं पूर्ण ॥
नैराश्यचक्रेंकरून ॥ लोभभाते उडविले ॥७०॥
स्वरूप साक्षात्कारबाणीं ॥ सिद्ध पातकां सांडी खंडूनी ॥
बोधफरशेंकरूनी ॥ मोहध्वज छेदिले ॥७१॥
अनुसंधानपरिघ घेऊन ॥ अविद्यारथ केला चूर्ण ॥
द्वैत रथांग छेदून ॥ अभेदपट्टिश टाकिलें ॥७२॥
निवृत्तिअसस्त्रें घालून ॥ प्रवृत्तिशस्त्रें केलीं चूर्ण ॥
विरक्तिगदा घेऊन ॥ कामकुंजर विदारिले ॥७३॥
क्रोध मद मत्सर अहंकार ॥ हे पुढें होते पायभार ॥
शम दम अस्त्रें अनिवार ॥ त्यांनीं चूर्ण केले ते ॥७४॥
संकल्प द्वेष कुटिल ॥ हे असुरांचे तुरंग सबळ ॥
हे समाधानशक्तीनें सबळ ॥ विदारून पाडिले ॥७५॥
आशा मनशा कामना पूर्ण ॥ ह्या भिंडिमाळा येती दारुण ॥
मनोजयाचें पुढें वोडण ॥ रामभक्त करिती हो ॥७६॥
आतां असो पाल्हाळ ॥ वानरीं रगडिलें असुरदळ ॥
रावण घाली बाणजाळ ॥ मायापडळ जयापरी ॥७७॥
रथारूढ लंकानाथ ॥ जैसा नगरमस्तकीं बलाहक ॥
पृथ्वीवरी अयोध्यापालक ॥ ठाण मांडून उभा असे ॥७८॥
वाचस्तीसी म्हणे इंद्र ॥ राजाधिराज श्रीरामचंद्र ॥
त्रिभुवनेश्वर गुणसमुद्र ॥ उदार धीर गुणाब्धि ॥७९॥
सीतेचें करूनि निमित्त ॥ आम्हां करावया बंधनमुक्त ॥
युद्ध करीत रघुनाथ ॥ धाडावा रथ ये समयीं ॥८०॥
मातली सारथि चतुर जाण ॥ तयासी सांगे सहस्रनयन ॥
शस्त्रास्त्रीं भरून स्यंदन ॥ अश्वरत्‍नें दिव्य जीं ॥८१॥
माझा रथ तेजागळा ॥ सत्वर नेईं सुवेळाचळा ॥
मातली आज्ञा वंदोनि ते वेळां ॥ निघाला परम वेगेंसी ॥८२॥
त्रुटीं न वाजतां तत्काळीं ॥ रथ आणी रामाजवळी ॥
खालीं उतरून ते काळीं ॥ वंदी मातली रामातें ॥८३॥
म्हणे राजीवाक्षा तमालनीला ॥ रहस्राक्षें रथ्ज्ञ पाठविला ॥
यावरुतें आरूढोनियां येवेळां ॥ मग युद्धासी प्रवर्तावें ॥८४॥
माझें नाम मातलीं ॥ रथ फिरवीन रणमंडळी ॥
ऐसें ऐकतां ते वेळीं ॥ जगदात्मा संतोषला ॥८५॥
म्हणे धन्य धन्य शचीनाथ ॥ समय पाहून केलें उचित ॥
जैसा क्षुधित देखोनि अत्यंत ॥ भोजन त्यासी देइंजे ॥८६॥
कं तृषितासी जीवन शीतळ ॥ कीं रोगियासी रसराज निर्मळ ॥
कीं मरतयासी तत्काळ ॥ सुधारस पाठविला ॥८७॥
दुर्बळासी दीजे धन ॥ कीं रणीं पाठिराखा ये धांवोन ॥
तैसा पुरंदरें स्यंदन ॥ समयोचित पाठविला ॥८८॥
मग प्रदक्षिणा करून ॥ रथीं चढला रघुनंदन ॥
उदयाचळीं सहस्रकिरण ॥ कीं नारायण सुपर्णीं ॥८९॥
जगद्वंद्य तो दशरथी ॥ रणमंडळीं जाहला महारथी ॥
पुढें मातली चपळ सारथी ॥ त्वरें धुरेसी बैसला ॥९०॥
रघुनाथे बैसला देखोन ॥ आनंदले वानरगण ॥
म्हणती धन्य शचीरमण ॥ पाठिराखा पूर्ण होय ॥९१॥
रामासी देवेंद्र धाडिला रथ ॥ दृष्टीं देखोनि लंकानाथ ॥
दुःखें दाटला अत्यंत ॥ दांत खात करकरां ॥९२॥
दृष्टीं देखोनि राजहंस ॥ परम संतापे वायस ॥
कीं सभाग्य देखोनि दुर्जनांस ॥ महाद्वेष उपजे पैं ॥९३॥
कीं देखोनि संतांची लीला ॥ निंदकांसी उपजे कंटाळा ॥
शिवप्रतिमा देखोन डोळां ॥ म्लेंच्छ जैसे संतापती ॥९४॥
कीं हरिकीर्तन ऐकोन ॥ विटे भूतप्रेतांचें मन ॥
तैसा क्षोभला रावण ॥ रथ देखोनि ते काळीं ॥९५॥
इंद्रजित पडिला रणीं ॥ त्याहून दुःख वाटलें मनीं ॥
मंदोदरी विटंबिली वानरगणीं ॥ दुःख त्याहून हें वाटे ॥९६॥
असो परम क्रोध रावण ॥ सोडी बाणांपाठीं बाण ॥
अचुक रामाचें संधान ॥ करी चूर्ण सवेंचि ॥९७॥
सिंहासारिखे दोघेजण ॥ घे घे शब्द करिती दारुण ॥
एकमेकांवरी टाकिती बाण ॥ मंडप वरी घातला ॥९८॥
भयभीत त्रिभुवन ॥ आकाश न दिसे बाणेंकरून ॥
विमानें सोडोनि सुरगण ॥ पळों लागले तेधवां ॥९९॥
बाण दाटले अद्‌भुत ॥ न चालती शशिमित्ररथ ॥
वायूस फिरावया तेथ ॥ रीघ सर्वथा नसेचि ॥१००॥
रुधिरधारा मेघ वर्षती ॥ नक्षत्रें खळखळां रिचवती ॥
विद्युलता बहुत पडती ॥ कांपे जगती चळचळां ॥१॥
सप्त पाताळें आंदोळती ॥ शेष कूर्म दचकले चित्तीं ॥
राक्षस वानर कांपती ॥ युद्ध पाहतां दोघांचें ॥२॥
एक काळ एक महाकाळ ॥ एक दावाग्नि एक वडवानळ ॥
क्रोधेंकरून भूमंडळ ॥ दोघेही गिळूं भाविती ॥३॥
पदक्रमवर्णक्रमेंकरून ॥ पंडित करिती वेदाध्ययन ॥
तैसे रघुनाथाचे बाण ॥ परमवेगें सूटती ॥४॥
दोनी रथ धडाडले ॥ समरीं एके ठायीं मिळाले ॥
अश्व अश्वांसहित संघटले ॥ उभे राहिले दोहीं चरणीं ॥५॥
सारथि सारथीयाला म्हणत ॥ रणधुमाळीं मांडली अद्‌भुत ॥
दोहीं दळीं एकचि आकांत ॥ कोल्हाळ करिती वीर तेव्हां ॥६॥
सारथी परम चतुर ॥ माघारे सारिले रहंवर ॥
जैसे पंडित वाद करोनि अपार ॥ क्षण एक स्थिरावती ॥७॥
तैसे रथ माघारे करून ॥ सवेंच बाण सोडिती सघन ॥
पर्जन्य जैसा ओसरोन ॥ सवेंच मागुती वृष्टि करी ॥८॥
कीं सागरा भरतें ओहटत ॥ सवेंच मागुती विशेष लोटत ॥
तैसे बाणांचे पर्वत ॥ एकावरी एक टाकिती ॥९॥
सप्त दिन अहोरात्र ॥ होत युद्धाचें घनचक्र ॥
परी रामरावणीं क्षणमात्र ॥ विसांवा घेतलाच नाहीं ॥११०॥
रामें काढिले चार बाण ॥ सोडिले चापासी लावून ॥
रथींचे चारी वारू छेदून ॥ अकस्मात टाकिले ॥११॥
तंव रावणें न लागता क्षण ॥ नूतन तुरंग जुंपिले पूर्ण ॥
मग नरवीर श्रेष्ठ रघुनंदन ॥ काय करिता जाहला ॥१२॥
काढिला अर्धचंद्र बाण ॥ जैसा नवग्रहांत चंडकिरण ॥
तो शरासनावरी योजून ॥ मनोवेगें सोडिला ॥१३॥
सवेंचि रावणा न लागतां क्षण ॥ अर्धचंद्रबाण टाकावा तोडून ॥
म्हणून तीक्ष्ण शक्ति योजिली पूर्ण ॥ तो बाण हृदयीं आदळला ॥१४॥
त्या बाणें जाऊन एकसरें ॥ पाडिलीं रावणाचीं दाही शिरें ॥
परी सवेंच निघालीं परिकरें ॥ पूर्विल्या ऐसीं तेधवां ॥१५॥
सवेंचि रविचक्रवदन शर ॥ रामें सोडिला अनिवार ॥
शिरें छेदिलीं समग्र ॥ मागुती तेसींच उद्‌भवली ॥१६॥
देव आणि वानर ॥ अवघें जाहले चिंतातुर ॥
आतां कैसा मरेल दशकंधर ॥ वारंवार शिरें निघती ॥१७॥
राजाधिराज रघुनाथ ॥ क्षणैक जाहला चिंताक्रांत ॥
तंव तो मातली सारथि बोलत ॥ राघवाप्रति ते काळीं ॥१८॥
म्हणे अनंतब्रह्मांडनायका ॥ सकळचित्तपरीक्षका ॥
आधीं फोडूनि अमृतकूपिका ॥ मग मस्तकां पाडीं धरणीवरी ॥१९॥
ऐसे मातली बोलत ॥ तयासी गौरवी जनकजामात ॥
मग बाण काढिला त्वरित ॥ अगस्तिदत्त मुख्य जो ॥१२०॥
जैसा देवांमाजीं सहस्रनयन ॥ कीं अंडजांमाजीं विष्णुवहन ॥
काद्रवेयांत सहस्रवदन ॥ तैसा बाण समर्थ तो ॥२१॥
कीं वानरांमाजीं हनुमंत ॥ कीं शस्त्रांमाजीं वेदांत ॥
कीं नक्षत्रांसी आदित्य ॥ तैसा बाण समर्थ तो ॥२२॥
शस्त्रांमाजी सुदर्शन ॥ तीर्थांमाजीं प्रयाग पूर्ण ॥
नक्षत्रांसी झांकी आदित्य ॥ तैसा बाण समर्थ तो ॥२३॥
शेष कूर्म वराह धरणी ॥ सप्तसमुद्र शशी तरणी ॥
इतुक्यांचीं सत्वें काढूनी ॥ त्या बाणाठायीं ठेविलीं ॥२४॥
अग्नि वायु शचीरमण ॥ चंडांशु कुबेर यम वरुण ॥
त्रिदश ऋषींचीं सामर्थ्ये पूर्ण ॥ त्या बाणाग्नीं वसती हो ॥२५॥
तो तुणीरांतून काढितांचि बाण ॥ झांकले समस्तांचे नयन ॥
सहस्रसूर्याचा प्रकाश पूर्ण ॥ भूमंडळीं दाटला ॥२६॥
त्या बाणामुखीं ब्रह्मास्त्र ॥ स्थापिता जाहला राजीवनेत्र ॥
चापासि लाविला शर ॥ विषकंठवंद्ये ते समयीं ॥२७॥
सीताधवें ते वेळां ॥ वरी आकर्ण बाण ओढिला ॥
ते वेळां वाटलें लोकां सकळां ॥ काय मांडला कल्पांत ॥२८॥
ऐसा बाण तो सबळ ॥ अत्यंत तेजाचा कल्लोळ ॥
शशी सूर्य लोपले सकळ ॥ सुरवर विमानें पळविती ॥२९॥
जळीं रिता घट डळमळी ॥ तैसा पृथ्वी तेव्हां हेलावली ॥
प्रचंड वीर ते वेळीं ॥ मूर्च्छित पडों लागले ॥१३०॥
जगद्वंद्याचें कर्णी वचन ॥ संागतसे तेव्हां बाण ॥
कुपीसमवेत प्राण ॥ नेतों स्वामी दशकंठाचा ॥३१॥
असो रावणाचें वक्षःस्थळ ॥ लक्षोनियां तमालनीळ ॥
बाण सोडी तत्काळ ॥ ब्रह्मांडगोळ उचंबळला ॥३२॥
मिळोनियां असंख्य चपळा ॥ एकदांचि कडकडोनि पडिल्या ॥
तैसाच बाण ते वेळां ॥ हृदयीं संचरला रावणाचे ॥३३॥
कुपीसहित वक्षःस्थळ ॥ बाण फोडोनि गेला तत्काळ ॥
हृदयी छिद्र पडिलें विशाळ ॥ गवाक्षद्वारासारिखें ॥३४॥
सवेंच परतला तो बाण ॥ रावणाचीं तीन शिरें छेदून ॥
रघुपतीचें भातां येऊन ॥ आपले आपण रिघाला ॥३५॥
उरली शिरें छेदावयातें ॥ आणिक शर काढिला रघुनाथें ॥
प्रार्थिले तेव्हां उर्मिलाकांतें ॥ युद्ध आतां पुरे जी ॥३६॥
रावणें सोडिला प्राण ॥ त्यासी न शिवती तुझें बाण ॥
आतां जवळी जाऊन अवघेजण ॥ प्रेत पाहूं तयाचें ॥३७॥
धनुष्य तृणीरासहित ॥ सौमित्राजवळी राम देत ॥
आमुचे अवताराचें कृत्य समस्त ॥ आजपासूनि संपलें ॥३८॥
जाहला एकचि जयजयकार ॥ जयवाद्यें वाजविती सुरेश्वर ॥
दुंदुभीच्या नादें समग्र ॥ ब्रह्मांड तेव्हां दणाणिलें ॥३९॥
रघुपतीवरी ते वेळां ॥ अद्‌भुत पुष्पवर्षाव जाहला ॥
गणगंधर्व किन्नरमेळा ॥ सुवेळाचळीं धांवत ॥१४०॥
संतोषले सकळा ऋषीश्वर ॥ आनंदें नाचती वानर ॥
त्रिभुवन आनंदले थोर ॥ रामें रावण वधियेला ॥४१॥
रघुनाथाचे वीर सकळ ॥ रावणाभोवते मिळाले तत्काळ ॥
जैसा वृक्ष उन्मळे समूळ ॥ तैसा विशाळ पडियेला ॥४२॥
मुखावरी गृध्र बैसोन ॥ रावणाचे फोडिती नयन ॥
रक्त जातसे वाहून ॥ सैरावैरां चहूंकडे ॥४३॥
मुखीं शिरी पडली धुळी ॥ मुकुट लोळती भूमंडळी ॥
असो समस्त पाहती ते वेळीं ॥ बिभीषण दुःखें उचंबळला ॥४४॥
शरीर टाकिलें धरणीवरी ॥ हृदय पिटी दोहीं करी ॥
म्हणे दिशा शून्य याउपरी ॥ माझ्या पडल्या निर्धारें ॥४५॥
अगाद्य जयाचे प्रतापबळ ॥ क्रोधे जैसा वडवानळ ॥
चातुर्याचा सागर केवळ ॥ खंडें केली वेदांचीं ॥४६॥
परम जयाचे तप दारुण ॥ संतति संपत्तियुक्त पूर्ण ॥
जेणें देवांचे गर्व हरून ॥ बंदी सर्व घातले ॥४७॥
जयाकारणें आदिपुरुषें ॥ अवतार धरिला राघवेशें ॥
अद्‌भुत कर्तव्य केलें लंकेशें निर्गुण आणिलें सगुणत्वा ॥४८॥
जो परम पुरुष निर्विकार ॥ तो प्रत्यक्ष दाविला साकार ॥
जानकी आणून उपकार ॥ केला अम्हांवरी रावणें ॥४९॥
जो वेदवंद्य राजीवनेत्र ॥ तो आमुचा जाहला प्राणमित्र ॥
हा रावणें केला उपकार ॥ सुग्रीवासहित आम्हांवरी ॥१५०॥
तो श्रीराम परब्रह्म चित्स्वरूप ॥ त्याचिया अवताराचें केले रूप ॥
आपुला वाढविला प्रताप ॥ चंद्रार्कवरी रावणें ॥५१॥
श्रीराम म्हणे बिभीषणाप्रती ॥ तूं केवळ विवेकमूर्ती ॥
नाशिवंताचा शोक चित्तीं ॥ कायनिमित्त धरियेला ॥५२॥
हा जगडंबर पसारा केवळ ॥ मायिक जैसें मृगजळ ॥
कीं वंध्यावल्लीचें फळ ॥ मुळापासूनि लटिकेचि ॥५३॥
पिंड ब्रह्मांड नाशिवंत ॥ आकार तेथें विकार सत्य ॥
तरी मुळींच जें अशाश्वत ॥ त्याचा शोक कासया ॥५४॥
ऐसें बोलत रघुनंदन ॥ उगाच राहे बिभीषण ॥
तों सकळ स्त्रियांसहित धांवोन ॥ मंदोदरीही तेथें आली ॥५५॥
कवळूनियां पतीचे प्रेत ॥ मंदोदरी शोक करित ॥
ऐशीं सहस्र स्त्रिया आल्या पिटीत ॥ वक्षःस्थळ धबधबां ॥५६॥
मंदोदरी म्हणे प्राणनाथा ॥ तुजविण आम्ही सर्व अनाथा ॥
जयलक्ष्मी देऊन रघुनाथा ॥ राम जामात पैं केला ॥५७॥
लंकागजमस्तकीं अद्‌भुत ॥ केसरी चढला हा रघुनाथ ॥
काढोनियां दिव्य मुक्त ॥ रणमंडळीं टाकिलें ॥५८॥
सौभाग्यतारूं लंकानाथ ॥ आजि बुडालें अकस्मात ॥
कीं वेदांचें सांठवण समस्त ॥ फुटलें आजि रणांगणी ॥५९॥
सीतेच्या मिषेंकरून ॥ जवळी आणिला रघुनंदन ॥
बाहेर विरोध अंतरीं भजन ॥ दशकंधरें पै केलें ॥१६०॥
फणसासी कांटे दिसती वरी ॥ परी अत्यंत गोड अंतरीं ॥
तैसीच रावणें केली परी ॥ विरोध बाहेर दावूनियां ॥६१॥
ऐसी मंदोदरी शोक करित ॥ भोंवते विलोकिती समस्त ॥
मग बिभीषणासी रघुनाथ ॥ काय बोलता जाहला ॥६२॥
ज्येष्ठबंधूची राणी ॥ मंदोदरी हे ज्ञानखाणी ॥
पतिव्रतांमाजी शिरोमणी ॥ इचें स्मरणीं दोष नुरे ॥६३॥
इचें प्रातःकाळीं करितां स्मरण ॥ उद्धरतील पापीजन ॥
बिभीषण तूं करी धरून ॥ निजमंदिराप्रति धाडीं ॥६४॥
ऐसें बोलता रघुनंदन ॥ मयजेपासीं आला बिभीषण ॥
तियेतें स्वकरी धरून ॥ म्हणे माये चाल सदनाप्रति ॥६५॥
मयजेस म्हणे चापपाणी ॥ माये तूं ज्ञानविचारखाणी ॥
मुळीं दृष्टी घालोनी ॥ अद्वरज्ञानें पाहें पां ॥६६॥
अहंकार तितुका नाशिवंत ॥ आत्मस्वरूप पूर्ण शाश्वत ॥
ऐसें जाणोन किमर्थ ॥ शोक व्यर्थ करावा ॥६७॥
ऐसें बोलतां सच्चिदानंद ॥ मयकन्या उगीच स्तब्ध ॥
नमोनि रामचरणारविंद ॥ निजधामा चालिली ॥६८॥
मयकन्येसह सर्व अंगना ॥ बिभीषणें पाठविल्या सदना ॥
मग पुसोनि रघुनंदना ॥ राजदेह उचलिला ॥६९॥
सर्वांत सरिता पावन ॥ सिंधुसंगमी प्रेत नेऊन ॥
प्रळयवन्हि चेतवून ॥ आंत घातलें कलेवरा ॥१७०॥
तेथेंच उत्तरक्रिया समस्त ॥ स्वयें ब्रह्मदेव सांगत ॥
तैसी बिभीषण करित ॥ शास्त्ररीतींप्रमाणें ॥७१॥
असो त्यावरी बिभीषण ॥ सुवेळेसी आला परतोन ॥
तों लंकेचे प्रजाजन ॥ बिभीषणासी भेटों आले ॥७२॥
विद्युज्जिव्ह प्रधान ॥ उरलें सकळ राक्षससैन्य ॥
श्रीरामापुढें येऊन ॥ लोटांगण घालिती ॥७३॥
काष्ठ भस्म होतां समग्र ॥ विझोनि जाय वैश्वानर ॥
तैसें समस्त विरालें वैर ॥ रावण रणीं पडतांचि ॥७४॥
सूर्योदयी निरसे तम ॥ ज्ञानोदयीं निरसे अज्ञान ॥
तैसा पडतांचि रावण ॥ अणुमात्र वैर नसे ॥७५॥
सुवेळेसी आले रजनीचर ॥ म्हणती आम्ही बिभीषणाचे आज्ञाधार ॥
लंकेत जाऊन वानर ॥ पाहती नगर चहूंकडे ॥७६॥
असो यावरी बिभीषण ॥ श्रीरामापुढें कर जोडून ॥
मृदु मंजुळ वचन ॥ प्रेमयुक्त बोलतसे ॥७७॥
म्हणे राजीवदलनयना ॥ पुराणपुरुषा सीतारमणा ॥
ब्रह्मांडनायका गुणसंपन्ना ॥ लंकेसी आतां चलावें ॥७८॥
विरिंचहिस्तनिर्मित नगर ॥ आपण दृष्टीं पहावे समग्र ॥
मग घेऊनि सीता सुंदर ॥ अयोध्येसी जाइंजे ॥७९॥
ऐसें बिभीषण बोले वचन ॥ तो जगद्‌गुरु सुहास्यवदन ॥
म्हणे तुज लंका दिधली दान ॥ तेथें आगमन आमुचें नव्हे ॥१८०॥
जैसें केलिया कन्यादान ॥ तियेचे गृही न घेती अन्न ॥
विप्रासी दिधले दिव्य सदन ॥ तेथें आपण न जावें ॥८१॥
सत्पात्रीं दिधलें गोदान ॥ मग तिचें दुग्ध घ्यावें काढून ॥
तैसे लंकेत माझे आगमन सर्वथाही न घडेचि ॥८२॥
त्यावरी भरतभेटीविण ॥ मी न करींच मंगलस्नान ॥
नानाभोग तांबूल भोजन ॥ व्रत संपूर्ण धरिलें असे ॥८३॥
मग सौमित्र आणि मित्रपुत्र ॥ तयांस म्हणे शतपत्रनेत्र ॥
तुम्ही वानर घेऊन सर्वत्र ॥ लंकेप्रति जाइंजे ॥८४॥
सुमुहूर्त पाहूनि सत्वर ॥ धरावें बिभीषणावरी छत्र ॥
बंदीचे राजे देव समग्र ॥ मान देऊनि मुक्त करावे ॥८५॥
बहुतांचिया वस्तू हरूनी ॥ रावणें ठेविल्या लंकाभुवनीं ॥
ज्यांच्या वस्तू त्यांलागूनि ॥ देऊनि सर्वां सुखी करा ॥८६॥
ऐशी आज्ञा होतां सत्वर ॥ चालिले सुग्रीव सौमित्र ॥
बिभीषण नमस्कार ॥ घाली साष्टांग रामातें ॥८७॥
श्रीराम बोले आशीर्वचन ॥ जैसा बळी ध्रुव उपमन्य ॥
त्यांचे पंक्तींत तूं बिभीषण ॥ चिरंजीव राहें सुखीं ॥८८॥
आज्ञा घेऊन ते अवसरी ॥ प्रवेशले लंकेभीतरी ॥
मुहूर्त पाहून झडकरी ॥ सर्व सामग्री सिद्ध केली ॥८९॥
वेदघोषेंमंत्रेंकरून ॥ सिंहासनी बैसविला बिभीषण ॥
दिव्य छत्रें वरी धरून ॥ सोहळा बहुत केला हो ॥१९०॥
बहुत -वस्त्रें भूषणे देऊन ॥ गौरविले सुग्रीव लक्ष्मण ॥
यावरी सकळ वानरसैन्य ॥ वस्त्राभरणीं गौरविले ॥९१॥
मग लंकेची समस्त रचना ॥ दाविली सुग्रीवलक्ष्मणां ॥
पाहतां धणी न पुरे नयनां ॥ आनंद मना जाहला ॥९२॥
असो आज्ञा मागोनि बिभीषणासी ॥ परतोन आले सुवेळेसी ॥
जाहलें वर्तमान रामासीं ॥ संागते जाहले तेधवां ॥९३॥
तों इंद्र आणि ब्रह्मा रुद्र ॥ तेतीस कोटी देव समग्र ॥
दृष्टीं पाहावया रघुवीर ॥ सुवेळाचळीं उतरले ॥९४॥
अष्ट वसु एकादश रुद्र ॥ मरुद्रणादि द्वादश ॥
गण गंधर्व यक्ष किन्नर ॥ सिद्ध -चारण उतरले ॥१५॥
अष्ट नायिका अष्ट दिक्पाळ ॥ आठ्यायशीं सहस्र ऋषिमंडळ ॥
छप्पन्न देशीचें भूपाळ ॥ रामदर्शना धांवन्निले ॥९६॥
सप्तद्वीप नवखंडीचें जन ॥ पाताळवासी काद्रवेयगण ॥
उपदेव कर्मदेव संपूर्ण ॥ सुवेळेसी पातले ॥९७॥
असंख्य वाद्यांचा गजर ॥ दिशा दणाणिती समग्र ॥
असो सुवेळेसी सुरेश्वर ॥ चहूंकडून मिळाले ॥९८॥
देवभारीं मुख्य तिघेजण ॥ ब्रह्मा इंद्र आणि ईशान ॥
परी कोणी कैसा रघुनंदन ॥ देखिला तें सांगतों ॥९९॥
दृष्टीं देखतां रघुवीर ॥ मनांत भावी अपर्णावर ॥
माझे हृदयीं तो सीतावर ॥ नामें शीतळ जाहलों मी ॥२००॥
त्यावरी सत्यलोकनायक ॥ तेणें देखोन रावणांतक ॥
त्यास भासला हा माझा जनक ॥ क्षीराब्धिवासी जगदात्मा ॥१॥
इंद्रासी वाटलें ते अवसरीं ॥ पाठिराखा आमचा कैवारी ॥
ऋषि भाविती अंतरीं ॥ आराध्य दैवत आमुचें ॥२॥
कोटी कंदर्पांचा जनिता ॥ ऐसें सुरगण भाविती तत्वतां ॥
पूर्ण ब्रह्म हें तद्‌भक्तां ॥ हृदयीं भासलेसें ते काळीं ॥३॥
असो सदाशिव देखोनी ॥ सीतानाथ आनंदला मनीं ॥
आसन सोडूनि चापपाणी ॥ सामोरा पुढें धांवत ॥४॥
त्रिपुरारीच्या चरणांवरी ॥ नमर जों करी रावणारि ॥
तों शिवें धरूनि वरच्यावरी ॥ दृढ हृदयीं आलिंगिला ॥५॥
श्रीराम जीमूतनीलवर्ण ॥ कर्पूरगौर त्रिलोचन ॥
इंदुमंडळीं दिसे मृगचिन्ह ॥ तेसे शोभले ते काळीं ॥६॥
क्षीराब्धीमाजी नीलवर्ण ॥ शोभे जेवीं आदिनारायण ॥
कीं जान्हवीजळी यमुनाजीवन ॥ कृष्णवर्ण मिसळलें ॥७॥
कीं भक्तांचे संपुष्टांत ॥ शालिग्राममूर्ति शोभत ॥
तैसे शिव आणि सितानाथ ॥ क्षोभले तेव्हां आलिंगनीं ॥८॥
सेवावया सीतोत्पलमकरंद ॥ प्रीतीनें संघटे जैसा मिलिंद ॥
तैसा शिव आनंदकंद ॥ सीताजीवनें आलिंगिला ॥९॥
ते एक असती दोघेजण ॥ शिव विष्णू नामेंचि भिन्न ॥
अभेद अनाम निर्गुण ॥ तेथींचे कोंभ असती हे ॥२१०॥
असो यावरी कमलासन ॥ देता जाहला आलिंगन ॥
माझा पिता हा नारायण ॥ म्हणूनि हृदयीं धरियेला ॥११॥
याउपरी दशशतनेत्र ॥ घाली साष्टांग नमस्कार ॥
तप्तकांचनवर्ण सुंदर ॥ रघुवीर उठवी तयातें ॥१२॥
सहस्रनेत्रासी चापपाणी ॥ हृदयीं धरी प्रीतीकरूनि ॥
मग सुरांस कैवल्यदानी ॥ भेटता जाहला आनंदें ॥१३॥
असो सकळ देवांसमवेत ॥ सभेसी बैसले रघुनाथ ॥
एकचि वाद्यांचा गजर होत ॥ अष्टनायिका नाचती ॥१५॥
वीणा घेऊन सत्वर ॥ गाती नारद आणि तुंबर ॥
सामगायन परिकर ॥ ऐके रघुवीर सादरें ॥१६॥
रामविजय ग्रंथ पावन ॥ युद्धकांड संपले येथून ॥
उत्तरकांड गहन ॥ आतां येथोनि अवधारा ॥१७॥
मुकुटावरी मणि शोभत ॥ तेवीं उत्तरकांड गोड बहुत ॥
कीं देवालयावरी झळकत ॥ कळस जैसा सतेज ॥१८॥
भोजनांतीं दध्योदन ॥ कीं श्रवणांतीं मनन ॥
तपाचे अंतीं फळ पूर्ण ॥ उत्तरकांड रसिक तैसें ॥१९॥
आरंभी कथा सुरस तेथ ॥ भेटतील जानकी रघुनाथ ॥
मूळ जाईल हनुमंत ॥ राघवआज्ञा घेऊनियां ॥२२०॥
ती कथा गोड बहुत ॥ श्रवण करोत श्रीरामभक्त ॥
जे ब्रह्मानंदें डुल्लत ॥ प्रेमळ चित्त जयांचे ॥२१॥
श्रीमद्‌भीमातटविलासिया ॥ ब्रह्मानंदा गुरुवर्या ॥
श्रीधर अनन्य शरण पायां ॥ कायावाचामनेंसी ॥२२॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत पंडित चतुर ॥ त्रयस्त्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२२३॥
युद्धकांड समाप्त ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय चौतिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जयजय जगद्वंद्या वेदसारा ॥ प्रणवरूपा विश्वंभरा ॥
करुणार्णवा परम उदारा ॥ राघवेंद्रा श्रीरामा ॥१॥
मन्मथदहनहृदयरत्‍न ॥ चतुरास्यजनका मनरंजना ॥
मंगलभगिनीमनमोहना ॥ जगज्जीवना भक्तवरदा ॥२॥
लागतां प्रळयरूप आघात ॥ शरीरप्रारब्धें येती अनर्थ ॥
तेथें खेद न मानी चित्त ॥ सीतावल्लभ करीं ऐसें ॥३॥
बोध बैसो हृदयीं अनुदिनीं ॥ शांति क्षमा दया उन्मनी ॥
या विलसोत मानससदनीं ॥ ऐसें करी श्रीरामा ॥४॥
विविध आकृती चराचरचना ॥ तुझीं स्वरूपें भासोत नयना ॥
वमन देखोन वीट ये मना ॥ विषयीं वासना न रामो तैसी ॥५॥
श्रवणकीर्तनादि नवविधा भक्ति ॥ सत्समागम घडो अहोरात्रीं ॥
तुझीं लीला चरित्रें ऐकतां सीतापती ॥ चित्तवृत्ति आनंदो ॥६॥
माझें मन आणि बुद्धि पाहीं ॥ वांकीं नेपुरें होऊत पायीं ॥
प्रेमीपीतांबर सर्वदाही ॥ जघनीं विलसो तूझिया ॥७॥
माझे स्थूल देह लिंग देखा ॥ तुझे पायीं विलसोत पादुका ॥
ताटिकांतका अयोध्यानायका ॥ सर्वदा करीं ऐसेंचि ॥८॥
माझिया पंचप्राणांचा मेळा ॥ यांचीं कुंडलें पदकमाळा ॥
ब्रह्मानंदा भक्तवत्सला ॥ सर्वदा करीं ऐसेंचि ॥९॥
उत्तराकांड हेचि भागीरथी ॥ प्रावारूपें चाले सरस्वती ॥
तरी दृष्टांतक्षेत्रें विराजती ॥ एकाहून एक विशेष ॥१०॥
असो गतकथाध्यायीं दशकंधर ॥ वधोनि विजयी जाहला रघुवीर ॥
याउपरी सकळ सुरवर ॥ श्रीरामदर्शना पातले ॥११॥
सुरांची दाटी जाहली बहुत ॥ मुकुटांसी मुकुट आदळत ॥
रत्‍नें झळकती अमित ॥ भगणांहूनि तेजागळीं ॥१२॥
गण गंधर्व यक्ष किन्नर ॥ सुरासुर नर वानर ॥
सुवेळाचळीं जाहले एकत्र ॥ गजर थोर होतसे ॥१३॥
तो मारुतीचे मनांत ॥ केव्हां आज्ञा देईल रघुनाथ ॥
कीं जानकी आणावी त्वरित ॥ रावणांतक वदेल तेव्हां ॥१४॥
क्षणक्षणांत वायुकुमर ॥ विलोकी राघववदनचंद्र ॥
तों मारुतीसी अयोध्याविहार ॥ आज्ञापिता जाहला ॥१५॥
म्हणे प्राणसखया हनुमंता ॥ सत्वर जाऊन गुणभरिता ॥
जानकी सौभाग्यसरिता भेटवीं आतां मजलागीं ॥१६॥
बिभीषणासी सांगून ॥ सीतेसी घालिजे मंगलस्नान ॥
वस्त्रें अलंकार देऊन ॥ सुखासनारूढ आणिजे ॥१७॥
ऐसें ऐकतां हनुमंत ॥ निराळपंथें चालिला त्वरित ॥
जैसें तान्हें वत्स काननांत ॥ जाय शोधीत धेनूसी ॥१८॥
मानसाप्रति मराळ जात ॥ कीं जीवन शोधी तृषाक्रांत ॥
कीं झेंपावें विनतासुत ॥ दर्शना जातां इंदिरेच्या ॥१९॥
तैसाच अशोकवनात ॥ प्रवेशता जाहला हनुमंत ॥
साष्टांगें शीघ्र प्रणिपात ॥ जानकीस घातला ॥२०॥
तान्हें बाळ चुकोनि गेलें ॥ तें जननीतें अकस्मात भेटलें ॥
कीं हरपलें रत्‍न सांपडलें ॥ तैसें वाटलें जानकीतें ॥२१॥
कीं प्राण जातां निःशेष ॥ वदनीं घालिजे सुधारस ॥
तैसी देखतां मारुतीस ॥ सीता परम संतोषली ॥२२॥
कर जोडोनि हनुमंत ॥ सीतेपुढें उभा राहत ॥
म्हणे सुखी आहे अयोध्यानाथ ॥ सेनेसहित सुवेळे ॥२३॥
कंटक दशकंठ वधून ॥ राज्यीं स्थापिला बिभीषण ॥
बंदीचें देव सुटून ॥ भेटों आले रघुत्तमा ॥२४॥
ऐसें सांगतां हनुमंत ॥ जगन्माता काय बोलत ॥
बारे वचन तुझें गोड बहुत ॥ अमृताहून आगळें ॥२५॥
प्राणसखया तूं यथार्थ ॥ मजकारणें श्रमलासी बहूत ॥
तुझें उपकार अमित ॥ अयोध्यानाथ जाणतसे ॥२६॥
षणमास मी कंठिलें अद्‌भुत ॥ आतां भेटवीं रघुनाथ ॥
ऐसें ऐकतां हनुमंत ॥ बिभीषणसदनीं प्रवेशला ॥२७॥
सांगे सकळ वर्तमान ॥ सीतेसी करवून मंगलस्नान ॥
वस्त्रें भूषणें देऊन ॥ चाल घेऊन सुवेळे ॥२८॥
ऐकोनि आनंदे बिभीषण ॥ मारुतीसी करी धरून ॥
प्रवेशला अशोकवन ॥ सीतादर्शन घ्यावया ॥२९॥
चिरंजीव दोघेजण ॥ रघुपतीचे प्रियप्राण ॥
जानकीजवळ येऊन ॥ बिभीषणें लोटांगण घातलें ॥३०॥
जगन्माता बोले वचन ॥ जोंवरी शशी चंडकिरण ॥
तोंवरी चिरंजीव होऊन ॥ राज्य करी लंकेचे ॥३१॥
बिभीषण जोडूनि कर ॥ उभा राहे सीतेसमोर ॥
जैसा अपर्णेजवळी कुमार ॥ कीं फरशधर रेणुकेपासीं ॥३२॥
बिभीषण म्हणे जगन्माते ॥ प्रणवरूपिणी सद्रुणसरिते ॥
अनादिसिद्धे अपरिमिते ॥ आदिमाये इंदिरे ॥३३॥
तुवां आदिपुरुष जागा करून ॥ अनंत ब्रह्मांड रचिलीं पूर्ण ॥
ब्रह्मा विष्णु उमारमण ॥ तुझीं बाळें तान्हीं हीं ॥३४॥
उत्पत्तिस्थिति पालन ॥ करविसी तिघांकडोन ॥
इच्छा परततां पूर्ण ॥ सवेंचि गोळा करिसी तूं ॥३५॥
तुझें तुजचि सर्व ठाऊकें ॥ नेणतपण धरिलें कौतुकं ॥
रावणें तुज आणिलें लंकें ॥ हेही इच्छा तुझीच पैं ॥३६॥
बंदीचें सुटले सुरवर ॥ मारुति सुग्रीवादि वानर ॥
आम्हां सर्वां जाहला राममित्र ॥ हा तों उपकार तुझाची ॥३७॥
यावरी करून मंगलस्नान ॥ वस्त्रें भूषणें अंगिकारून ॥
सुवेळेसी पाहावया रघुनंदन ॥ शीघ्र आतां चलावें ॥३८॥
जगन्माता बोले वचन ॥ राम न करितां मंगलस्नान ॥
म्यां आधीं करितां पूर्ण ॥ वाटे दूषण परम हें ॥३९॥
पतिव्रतेचा ऐसा होय धर्म ॥ पतीविण न करावा कार्य उपक्रम ॥
रघुपतीची आज्ञा नसतां अधर्म ॥ होय सर्व आम्हांसी ॥४०॥
मारुति म्हणे जगन्माते ॥ आज्ञा दिधलीं रघुनाथें ॥
दुजें बिभीषणवचनातें ॥ मान दिधला पाहिजे ॥४१॥
अवश्य म्हणे जनकनंदिनी ॥ तंव ते बिभीषणाची राणी ॥
सकळ उपचार घेऊनी ॥ अशोकवना पातली ॥४२॥
सरमा त्रिजटा दोघीजणी ॥ सीतेच्या प्राणसांगातिणी ॥
दोघींनीं जानकीची वेणी ॥ उकलिली तेधवां ॥४३॥
हनुमंत आणि बिभीषण ॥ बैसले एकीकडे जाऊन ॥
सरमेनें जानकीचें पूजन ॥ आरंभिलें स्वहस्तें ॥४४॥
उत्तम पट्टदुकूल आणूनी ॥ सीतेसी दिधली पडदणी ॥
मणिमय चौरंग घालोनि ॥ पाय धूतले सरमेनें ॥४५॥
सुगंध तेलाचा ते वेळीं ॥ त्रिजटा सीतेचे मस्तकीं घाली ॥
आशीर्वाद वचनें बोलिली ॥ स्नेहआदरेंकरूनि ॥४६॥
अनंत कल्याण कल्पपर्यंत ॥ दोघें नांदा आनंदभरित ॥
मृगमदाचें उटणें लावित ॥ सरमा आपण स्वहस्तें ॥४७॥
मळी काढिता म्हणे माये ॥ कृश जाहलीस जनकतनये ॥
असे उष्णोदक लवलाहें ॥ स्नानालागीं आणिलें ॥४८॥
त्रिजटा उदक घाली सवेग ॥ सरमा घांसी सीतेचें अंग ॥
बिभीषणें अलंकार सुरंग ॥ अमोलिक पाठविले ॥४९॥
प्रळयविजेहून तेजागळी ॥ चीर नेसली जनकबाळी ॥
दिव्य अलंकार लेइली ॥ जे त्रिभुवनीं दुर्लभ ॥५०॥
सूर्यमंडळातुल्य सुरेख ॥ कर्णीं वोप देती तांटक ॥
सर्व अलंकारांची अधिक ॥ कांति फांके दशदिशां ॥५१॥
कुंकुममळवट लाविला भाळीं ॥ मध्यें सुवास कस्तूरी रेखिली ॥
दिव्य सुगंध ते काळीं ॥ सर्वांगीं चर्ची त्रिजटा ॥५२॥
दिव्य फळांनी ते काळीं ॥ जानकीची ओंटी भरिली ॥
सरमा म्हणे मुखीं घाली ॥ जननी फळ एक आतां ॥५३॥
मग ते अमृतफळ सुस्वाद ॥ सुंदर आणि बहु सुगंध ॥
बिभीषण मारुतीसी प्रसाद ॥ जानकीनें दीधला ॥५४॥
सरमा आणि त्रिजटेप्रति ॥ फळें दिधलीं परम प्रीतीं ॥
मग एक फळ घेऊनि हातीं ॥ वदनीं घातले जानकीनें ॥५५॥
सवेंचि प्रक्षाळिले वदन ॥ तों जवळी आला बिभीषण ॥
दिव्य मणिमय हार आणून ॥ जानकीपुढें ठेविला ॥५६॥
त्रिभुवनमोल एक मणी ॥ रावणें ठेविला होता कोशसदनी ॥
तो बिभीषणें देतां प्रीतीकरूनी ॥ गळां घाली जगन्माता ॥५७॥
तों लंकेचे सकळ दळ ॥ सिद्ध जाहलें तात्काळ ॥
अठरा अक्षौहिणी वाद्यें प्रबळ ॥ वाजों लागलीं तेधवां ॥५८॥
रत्‍नजडित शिबिका आणोनी ॥ सीतेपुढें ठेविली ते क्षणी ॥
बिभीषण मारुति लागती चरणीं ॥ सुखासनीं बैसावें ॥५९॥
सरमा त्रिजटा यांचें कंठीं ॥ जानकी घाली दृढ मिठी ॥
म्हणे प्राणसख्यानो दृष्टीं ॥ तुम्हांस कधी मी देखेन ॥६०॥
सरमा त्रिजटेचे नयनीं ॥ अश्रु आले ते क्षणीं ॥
रुदन करिती स्फुंदस्फुंदोनी ॥ चरणीं मिठी घालिती ॥६१॥
मग आपुले कुरळ केशेंकरून ॥ झाडिले जानकीचे चरण ॥
पालखीत बैसविती नेऊन ॥ सद्रद होऊनि बोलती ॥६२॥
अवो प्राणसखे जनकनंदिनी ॥ आम्हां न विसरावें मनींहूनी ॥
सीता म्हणे उपकार साजणी ॥ तुमचे न विसरें कदाही ॥६३॥
तों शिबिकेवरी आवरण ॥ बिभीषणें घातलें पूर्ण ॥
जैसा परीक्षक दिव्य रत्‍न ॥ पेटीमाजी रक्षितसे ॥६४॥
कीं हृदयींचें ज्ञान संत ॥ बाहेर न दाविती लोकांत ॥
कीं धनाढ्य जैसा आच्छादित ॥ निजधन आपुलें सर्वदा ॥६५॥
अतिउल्हासें वायुसुत ॥ सव्यभागीं जवळी चालत ॥
मध्यभागीं लंकानाथ ॥ बिभीषण जात त्वरेनें ॥६६॥
वहनवाहक बहुत वेगें ॥ चालिले सुवेळेचे मार्गे ॥
बिभीषण हनुमंत दोघे ॥ हात लाविती वहनासी ॥६७॥
सेना चालिली अद्‌भुत ॥ पुढें वेत्रपाणी धावत ॥
वाद्यांचा गजर होत ॥ दाटी बहुत जाहली ॥६८॥
स्कंद आणि गजवदन ॥ अपर्णेजवळी दोघेजण ॥
तैसे मारुति आणि बिभीषण ॥ प्रेमरंगें धांवती ॥६९॥
रामसेनेंत प्रवेशले सत्वर ॥ तों जाहला एकचि गजर ॥
पहावया धांवती वानर ॥ त्यांस वेत्रधार मारिती ॥७०॥
लंकापतीसी अयोध्याविहारी ॥ सांगून पाठवी ते अवसरीं ॥
आपले वेत्रधार आवरीं ॥ वानरांतें मारिती जे ॥७१॥
या सीतेलागीं कष्ट ॥ वानरीं केले उत्कृष्ट ॥
वहन उघडोनि स्पष्ट ॥ सीता कपींसीं पाहूं द्या ॥७२॥
जवळी असतां प्राणनाथ ॥ स्त्री उघडी सव्र जनांत ॥
वागतां दोष यथार्थ ॥ सर्वथा नाहीं तियेसी ॥७३॥
ऐसी आज्ञा होतां ते काळीं ॥ शिबिका उतरिली भूमंडळी ॥
आवरण काढितां जनकबाळी ॥ सर्वांनी देखिली एकदां ॥७४॥
वहनाबाहेर निघोनी ॥ त्रिभुवनपतीची ते राणी ॥
उघडली जैसी रत्‍नखाणी ॥ वैदेहतनया उभी तैसी ॥७५॥
पाहतां जियेचे मुखकमळा ॥ लोपती कोटी मृगांककळा ॥
कीं लावण्यसागरींचा उमाळा ॥ रूपा आला ते ठायी ॥७६॥
यावरी ते जगज्जननी ॥ आदिमाया विश्वखाणी ॥
पाहते जाहले भक्तशिरोमणी ॥ जे कां अवतार देवांचे ॥७७॥
जानकी देखतां साचार ॥ देव गण गंधर्व असुर ॥
मानसीं विकल्प साचार ॥ करिते जाहले तेधवां ॥७८॥
एवढें जिचें स्वरूप सुंदर ॥ परम दुरात्मा दशकंधर ॥
षण्मासपर्यंत दुराचार ॥ उगा कैसा असेल ॥७९॥
तो जगदात्मा रघुवीर ॥ जाणोनि सर्वांचे अंतर ॥
जानकीप्रति उत्तर ॥ काय बोलता जाहला ॥८०॥
वाद्यें वाजतां राहिली ॥ तटस्थ जाहली सुरमंडळी ॥
रीस वानर सकळी ॥ निवांतरूप ऐकती ॥८१॥
व्यंकटा भृकुटी करूनि क्रूर ॥ सीतेसी विलोकी रघुवीर ॥
म्हणे आपुला तूंचि विचार ॥ पाहें सत्वर येथोनी ॥८२॥
तुज घेऊन गेला असुर ॥ हा अपवाद वाढला दुर्धर ॥
तो निरसला समग्र ॥ सोडवून तुज आणिलें ॥८३॥
उरावरील उतरला पाषाण ॥ कीं रोग गुल्म गेले विरोन ॥
कीं जन्मांधासी आले नयन ॥ तेवीं आजी सुख वाटे ॥८४॥
तुज आम्ही सोडवून ॥ साच केलें आपुलें वचन ॥
आतां करावें वेगें गमन ॥ मना आवडे तिकडेचि ॥८५॥
मी सर्व संग सोडोनी ॥ उदास विचरेन काननीं ॥
कामकामना कांहीं मनीं ॥ उरली नाही आमुच्या ॥८६॥
आमुची वार्ता टाकोनि समस्त ॥ मना आवडे तो धरीं पंथ ॥
अथवा भलता नृपनाथ ॥ वरीं तुजला आवडे तो ॥८७॥
उभे राहून व्यर्थ कायी ॥ तूं विचरें भलतेठायीं ॥
मोकळ्या तुज दिशा दाही ॥ केल्या आम्ही एधवा ॥८८॥
मज कैकयीनें घातले बाहेर ॥ नाहीं सिंहासन आतपत्र ॥
सेवूनियां घोर कांतार ॥ वनचर सखे केले म्यां ॥८९॥
भक्षावया न मिळ अन्न ॥ राहें कंदमुळें सेवून ॥
वल्कलें परिधान करून ॥ तृणासनीं निजतसें ॥९०॥
याकरितां सीते पाहीं ॥ आमुचे संगतीं सुख नाहीं ॥
तरी तूं भलते पंथे जाई ॥ व्यर्थ काय राहूनियां ॥९१॥
सकळ उपाधि टाकून ॥ मी राहिलो निरंजनीं येऊन ॥
आम्हांसी नावडे दुजेपण ॥ प्रंपचवासना नसेचि ॥९२॥
ऐसें बोलतां रघुनाथ ॥ सीतेसी वाटला कल्पांत ॥
कीं शब्दरूपें शस्त्र तप्त ॥ अकस्मात जेवीं खोंचलें ॥९३॥
शब्द नव्हे ते सौदामिनी ॥ अंगावरी पडे ते क्षणी ॥
कीं शब्दसांडसेंकरूनी ॥ तोडिलें वाटे शरीर ॥९४॥
परम गहिवरें दाटोनी ॥ बोले तेव्हां मंगळभगिनी ॥
अग्नींत करपे कमळिणी ॥ तैसें तेज उतरलें ॥९५॥
नयनीं सुटल्या अश्रुधारा ॥ म्हणे जगद्वंद्या श्रीरामचंद्रा ॥
आनंदकंदा गुणसमुद्रा ॥ करा माझा वध आतां ॥९६॥
षण्मास कष्टी होऊन ॥ आजि दृष्टीं देखिले रामचरण ॥
तों पूर्वकर्म माझे गहन ॥ आडवें विघ्न हें आलें ॥९७॥
आनंदाचा उगवला दिन ॥ म्हणोनि वाटलें समाधान ॥
परी कर्माचें थोर विंदान ॥ पुढें आलें आजि पैं ॥९८॥
कामधेनूची काढितां धार ॥ शेराच्या चिकें भरलें पात्र ॥
अमृताच्या घटीं घातला कर ॥ तों विष दुर्धर भरलें असे ॥९९॥
परिसाच्या देवास येऊन ॥ लोहाचा भक्त भेटला पूर्ण ॥
परी तो कदा नव्हे सुवर्ण ॥ कर्म गहन पूर्वींचे ॥१००॥
मृगेंद्रें ज्यासी करीं धरिलें ॥ त्यासी जंबुकें येऊन फाडिलें ॥
सुपर्णगृहीं प्राणी राहिले ॥ त्यांसी डंखिलें विखारीं ॥१॥
याचक लवलाहें धांवला ॥ कल्पतरूखालीं आला ॥
त्यासी तेणें मार दिला ॥ शुष्क काष्ठ घेऊनियां ॥२॥
व्याघ्र मारूनि लवलाहें ॥ धन्यानें सोडविली गाय ॥
मग काष्ठप्रहारें तीस पाहें ॥ कां हो व्यर्थ मारावें ॥३॥
गंगापुरी बुडतां प्राणी ॥ कडेस काढिला धांवोनी ॥
मग त्यासी शस्त्रेंकरूनी ॥ कां हो व्यर्थ वधावें ॥४॥
भागीरथी भरूनि लवलाहीं ॥ सागरा शरण गेली पाहीं ॥
तो जरी म्हणे कीं ठाव नाहीं ॥ तरी गति तियेसी काय पुढें ॥५॥
जलचरां ठाव नेदी नीर ॥ पुढें त्यांचा काय विचार ॥
पक्षियांवरी कोपे अंबर ॥ तरी त्यांहीं जावें कोठें पां ॥६॥
जळत्या गृहाहूनि काढिलें ॥ मागुती वणव्यांत टाकिलें ॥
करुणासागरासी आलें ॥ भरतें क्रूर नवल हें ॥७॥
मातेनें बाळास दिधले विष ॥ पित्यानें वधिलें पुत्रास ॥
धन्यानें दंडिलें दासीस ॥ कोणाचे तेथें काय चाले ॥८॥
कांसेसी लाविलें कृपा करून ॥ मध्येंच दिधलें सोडून ॥
तेणें कोणासी जावें शरण ॥ तयावेगळें सांग पां ॥९॥
अन्नार्थी पात्रीं बैसले ॥ ते दातयानें दवडिले ॥
तरी त्यांचे बळ कांही न चाले ॥ तैसें जाहलें येथें हो ॥११०॥
सूर्य कोपला किरणांवरी ॥ समुद्र लहरींवरी दावा करी ॥
अमृत मधुरता बाहेरी ॥ आपली घालूं इच्छितसे ॥११॥
आपल्या शाखेसी अबोला ॥ कल्पद्रुमें जैसा धरिला ॥
चंद्रें कळांचा त्याग केला ॥ मेरु कोपला शिखरांवरी ॥१२॥
जैसी भागीरथी दोषविहीन ॥ कीं सर्वदा शुचि जैसा अग्न ॥
तैसी बोलता मी जाण ॥ शुचिष्मंत निजांगें ॥१३॥
दशकंधर गेला घेऊन ॥ मोहरीहून अन्याय सान ॥
मेरूइतका दंड पूर्ण ॥ समर्थे हा आरंभिला ॥१४॥
वातें कांपें कमळिणी ॥ तीवरी वज्र टाकी उचलोनी ॥
अन्याय नसतां कुरंगिणी ॥ व्यर्थ वनीं कां मारिजे ॥१५॥
कीं डागाअंगीं सुवर्ण ॥ हें अग्निसंगे कळे पूर्ण ॥
तरी मी आतां दिव्य घेईन ॥ सर्वांदेखतां येथेचि ॥१६॥
नयनीं वाहती अश्रुपात ॥ जानकी वानरां आज्ञापित ॥
म्हण कुंड करून अद्‌भुत ॥ अग्नि सत्वर पाजळा ॥१७॥
तत्काळ विस्तीर्ण केलें कुंड ॥ काष्ठापर्वत घातले उदंड ॥
अग्निज्वाळा माजल्या प्रचंड ॥ निराळ ग्रासूं धांवती ॥१८॥
जगन्माता बोले वचन ॥ जरी मी शुद्ध असेन ॥
तरीच येईन परतोन ॥ पहावया चरण स्वामींचे ॥१९॥
जरी मी दोषी असेन पूर्ण ॥ तरी भस्म करील हा अग्नि ॥
ऐसें तेव्हां बोलून ॥ सरसावली जगन्माता ॥१२०॥
सुरासुर वानर ऋक्ष मुनीश्वर ॥ अवघे जाहले चिंतातुर ॥
म्हणती हा अनर्थ थोर ॥ सुखामाजीं ओढवला ॥२१॥
असो रण माजलें देखोनी ॥ वीर निर्भय अंतःकरणीं ॥
तैसी अग्नीसमोर विदेहनंदिनी ॥ निर्भय मनीं सर्वदा ॥२२॥
कुंडासी करून प्रदक्षिणा ॥ दृष्टीभरी पाहिलें रघुनंदना ॥
कंठींचा सुमनहार काढूनि जाणा ॥ अग्नीवरी टाकिला ॥२३॥
सत्य जय सत्य म्हणोनी ॥ त्रिवार गर्जे त्रिजगज्जननी ॥
अग्निं कुंडीं तयेक्षणीं ॥ उडी घातली अकस्मात ॥२४॥
मंगळजननीचें हृदयरत्‍न ॥ अग्नीमाजी पडतांचि जाण ॥
कन्या गांजिली म्हणून ॥ भूमी कांपे थरथरां ॥२५॥
जाहली एकचि आरोळी ॥ शोकार्णवीं पडल कपिमंडळी ॥
सकळ सुरवर व्याकुळीं ॥ प्रळयकाळ भाविती ॥२६॥
दशदिशांमाजी दाटला धूर ॥ कढों लागले सप्त समुद्र ॥
वैकुंठ कैलासपदें समग्र ॥ डोलों लागली तेधवां ॥२७॥
थरथरां कांपे अंबर ॥ नक्षत्रें रिचवती अपार ॥
सौमित्रादि वायुकुमर ॥ नेत्रोदकें ढाळिती ॥२८॥
म्हणती अग्निमुखींहूनि पुढती ॥ पुन्हां कैंची देखों सीता सती ॥
बोलती सर्व कर्मगति ॥ परम दुर्धर वाटतसे ॥२९॥
एक घटिकापर्यंत ॥ अग्निमाजी जानकी गुप्त ॥
तों मस्तकीं पुष्पें घवघवित ॥ अकस्मात निघाली ॥१३०॥
पहिल्या रूपाहून आगळे ॥ शतगुणीं रूप जाहलें ॥
प्रभेनें भूमंडळ भरिलें ॥ आश्चर्य जाहलें ते वेळीं ॥३१॥
मागें अरण्यकांडीं कथा ॥ रेखेंत जाहली गुप्त सीता ॥
तें स्वरूप प्रकटलें आतां ॥ मिष दिव्यांचें करूनियां ॥३२॥
सीतास्वरूप जाहला होता अग्न ॥ तेणें राक्षसवन जाळून ॥
आपुल्या स्वरूपें येऊन ॥ दिव्यमिषें मिळाला ॥३३॥
सीता रामाची चिच्छक्ती ॥ ती गेलीच नाहीं लंकेप्रती ॥
हे खूण साधु संत जाणती ॥ जे कां वेदांती सज्ञान ॥३४॥
असो जानकी देखतां साचार ॥ जाहला एकचि जयजयकार ॥
अष्टदशपद्में वानर ॥ नमस्कार घालिती ॥३५॥
मग पुष्पांचे संभार ॥ सीतेवरी टाकिती सुरवर ॥
म्हणती सीता सती पवित्र ॥ सर्व नमस्कार घालिती ॥३६॥
सौमित्र सुग्रीव बिभीषण ॥ जानकीस घालिती लोटांगण ॥
हनुमंतें नमून चरण ॥ आनंदें पूर्ण नाचतसे ॥३७॥
असो श्रीरामाकडे सीता सती ॥ चालिली तेव्हां हंसगती ॥
मग उठोनियां रघुपती ॥ उभा ठाकला ते वेळे ॥३८॥
श्रीरामुख विलोकून ॥ सीता करी हास्यवदन ॥
धांवोनी दृढ धरिले चरण ॥ जगदगुरुचे ते काळीं ॥३९॥
मग जानकीस उठवोनी ॥ क्षेम देतसे कोदंडपाणी ॥
वामांकावरी मग घेउनी ॥ रघुनाथ तेव्हां बैसला ॥१४०॥
नवमेघरंग रघुनाथ ॥ जानकी विद्युल्लता तळपत ॥
सीता -राम देखोनि समस्त ॥ जयजयकार करिती तेधवां ॥४१॥
असुरांची वाद्यें ते काळीं ॥ माहागजरें गर्जो लागलीं ॥
आज्ञा घ्यावया ते काळीं ॥ देव उदित जाहले ॥४२॥
सदाशिव म्हणे रघुत्तमा ॥ पुराणपुरुषा पूर्णब्रह्मा ॥
आनंदकंदा निजसुखधामा ॥ पूर्णकामा सर्वेशा ॥४३॥
रविकुलभूषणा जलनेत्रा ॥ जनकजामाता नीलगात्रा ॥
सच्चिदानंदा सुहास्यवक्रा ॥ धन्य लीला दाखविली ॥४४॥
चराचरजीवचित्तचाळका ॥ अनंतब्रह्मांडपाळका ॥
राक्षस मर्दूनि सकळिकां ॥ निजभक्तां तारिलें ॥४५॥
युगानयुगीं धरूनि अवतार ॥ मर्दिले पापी दुष्ट असुर ॥
परी ये अवतारींचें चरित्र ॥ अगाध दाविलें श्रीरामा ॥४६॥
माझिये मनींचें आर्त बहुत ॥ केव्हां मी देखेन रघुनाथ ॥
तुझें नामें सकळ शांत ॥ हाळाहळ जाहले ॥४७॥
आतां सीतेसहित रामचंद्रा ॥ सत्वर जावें अयोध्यापुरा ॥
ऐसें बोलतां कर्पूरगौरा ॥ राघव काय बोलत ॥४८॥
म्हणें माझें तूं आराध्य दैवत ॥ अनादिसिद्ध कैलासनाथ ॥
विश्वंभर तूं विश्वातीत ॥ करणी अद्‌भुत दाविसी ॥४९॥
ब्रह्मांड जाळी हाळाहळ ॥ तें तुवां कंठीं धरिले तत्काळ ॥
लोक सुखी रक्षिले सकळ ॥ परम दयाळू तूं होसी ॥१५०॥
माझी स्तुति मांडिली दयाळा ॥ परी मी काय तुजवेगळा ॥
ऐसें श्रीराम बोलतां ते वेळां ॥ वदता जाहला कमलोद्‌भव ॥५१॥
म्हणे क्षीराब्धिवासिया नारायणा ॥ मधुकैटभारी भवभंजना ॥
अनंतवेषा अनंतवदना ॥ अनंतनयना अनंता ॥५२॥
परमात्मया तूं माझा तात ॥ नाभिकमळी जन्मलों यथार्थ ॥
सृष्टि रचिली हे अद्‌भुत ॥ तुझें आज्ञेंकरूनियां ॥५३॥
सृष्टीमाजी माजले असुर ॥ रावणकुंभकर्णादि क्रूर ॥
मग तुवां धरिला अवतार ॥ अयोध्येमाजी या रू पे ॥५४॥
पितृआज्ञेचें करूनि मिष ॥ वना आलासी परमपुरुष ॥
सीतेचे निमित्त राक्षसांस ॥ वधोनि भक्त रक्षिले ॥५५॥
राघव म्हणे कमळासना ॥ विश्वजनका वेदपाळणा ॥
सकळललाटपट्टलेखना ॥ जाणसी खुणा सर्वही तूं ॥५६॥
तुम्हां आम्हांसी वेगळेपण ॥ मुळापासूनि नाहीं पूर्ण ॥
परस्परें ठाउकी खूण ॥ तरी बाहेर स्तुति किमर्थ ॥५७॥
पौर्णिमेस उचंबळे समुद्र ॥ तैसा बोलता जाहला देवेंद्र ॥
हे अयोध्यानाथा जगदुद्धारा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥५८॥
आम्हांसी उपकार केले बहुत ॥ ते वेदांसही नव्हे गणित ॥
बंधच्छेदक तूं रघुनाथ ॥ अपरिमित गुण तुझे ॥५९॥
तरी माझे मनी एक आर्त ॥ ते तूं पूर्णकर्ता रघुनाथ ॥
कांही आज्ञा मज त्वरित ॥ केली पाहिजे ये काळीं ॥१६०॥
मी दासानुदास अनन्य ॥ मज काही सांगावें कारण ॥
तुझी आज्ञा मस्तकीं वंदीन ॥ मुकुटमणि जयापरी ॥६१॥
ऐसें बोलतां देवेंद्र ॥ परम सुखावला रामचंद्र ॥
म्हणे सहस्राक्षा तूं चतुर ॥ समयीं उपकार केलासी ॥६२॥
रणीं पाठविला दिव्य रथ ॥ तो आम्हांसी उपकार बहुत ॥
आम्हीं जय पावलो अद्‌भुत ॥ त्याच रथीं बैसोनियां ॥६३॥
इंद्र म्हणे श्रीरामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥
तुझियां प्रसादें मंगळधामा ॥ आम्ही स्वपदीं सुखीं असो ॥६४॥
रथ पाठविला समयासी ॥ म्हणोनि उपकार मानिसी ॥
चकोरांनीं काय चंद्रासी ॥ तृप्त करावें कवण्या गुणें ॥६५॥
चातकें तृप्त केला जलधर ॥ चक्रवाकांनीं दिवाकर ॥
समुद्राची तृप्ति थिल्लर ॥ कोण्या गुणें करील पैं ॥६६॥
वैरागरापुढें ठेविली गार ॥ क्षीराब्धिपुढें ठेविलें तक्र ॥
परम धनाढ्य कुबेर ॥ त्यासी कवडी समर्पिली ॥६७॥
आतां असो हे शब्दरचना ॥ मज कांहीं करावी आज्ञा ॥
म्हणोनि इंद्र लागला चरणा ॥ प्रेमादरेंकरूनियां ॥६८॥
मग इंद्रास तेव्हां उठवून ॥ बोले रामचंद्र सुहास्यवदन ॥
जेणेंकरूनि कर्ण ॥ तृप्त होती सकळांचे ॥६९॥
म्हणे वेदशास्त्रें बहुत ॥ धर्माधर्मी निवडिती पंडित ॥
परी एकचि गोष्टींत समस्त ॥ पापपुण्य निवडिलें ॥१७०॥
परोपकार ते पुण्य अद्‌भुत ॥ परपीडा तेंचि पाप यथार्थ ॥
शोधावे किमर्थ ग्रंथ बहुत ॥ मुख्य इत्यर्थ हाचि पैं ॥७१॥
तरी ऐसा जो परोपकार ॥ वानरां घडला अपार ॥
मज साह्य होऊनि समग्र ॥ यश बहुत जोडिले ॥७२॥
समरांगणीं दिधले प्राण ॥ असंख्य पडले प्रेतें होऊन ॥
परी त्यांचीं कुटुंबे आप्तजन ॥ शोकार्णवीं बुडतील ॥७३॥
तरी ते माझे सखे वानर ॥ पुनः जीववावे समग्र ॥
कोणाची अंगावरी अणुमात्र ॥ घाय क्षत न दिसावें ॥७४॥
अवघे आरोग्य होऊन ॥ सुखी असोत बहुत दिन ॥
त्यांचें जें वसंतें वन ॥ सदा सुफल पैं असो ॥७५॥
तरी हीच आज्ञा सत्वरा ॥ सिद्धी पाववी अमरेश्वरा ॥
ऐसें बोलतां परात्परसोयरा ॥ आनंद जाहला समस्तांसी ॥७६॥
इंद्रे चरणीं माथा ठेवून ॥ म्हणे जीववितों न लागतां क्षण ॥
याउपरी सीतारमण ॥ आज्ञा देत सकळांसी ॥७७॥
देव बैसोनि चालिले विमानीं ॥ धडकती दुंदुभीच्या ध्वनी ॥
दिव्य घंटा वाजती गगनीं ॥ आनंद मनीं न समाये ॥७८॥
शक्रआज्ञा होतां सत्वरी ॥ पीयूषमेघ वोळंबला अंबरीं ॥
गंभीर गर्जना ते अवसरीं ॥ करितां जाहला बलाहक ॥७९॥
पश्चिमेचा ढग उठत ॥ तैशा सौदामिनी लखलखत ॥
रणमंडळ लक्षोनि समस्त ॥ पीयूषवृष्टि जाहली ॥१८०॥
एक घटिका पर्यंत ॥ अपार वर्षलें अमृत ॥
वानर उठविलें समस्त ॥ निद्रिस्थ जागे होत जैसे ॥८१॥
श्रीरामापुढें जाऊन ॥ समस्त घालिती लोटांगण ॥
पर्जन्य गेला उघडोन ॥ सहस्रनयन आज्ञेनें ॥८२॥
आक्षेप घेती श्रोते चतुर ॥ वानर आणि रजनीचर ॥
एके ठायीं पडिले समग्र ॥ तरी असुर कां न उठवी ॥८३॥
वक्ता म्हणे नाटकरामायण ॥ तेथें ही कथा आहे संपूर्ण ॥
स्वयें बोलिला अंजनीनंदन ॥ अप्रमाण कोण म्हणे ॥८४॥
तें समस्त पाहूनि साचार ॥ प्रत्युत्तर देत श्रीधर ॥
तरी शंकरें भूतावळी समग्र ॥ आधींच होत्या पाठविल्या ॥८५॥
त्यांसी आज्ञापिलें शंकरें ॥ न भक्षावीं कपींचीं शिरें ॥
परी राक्षसांचीच कलेवरें ॥ तुम्ही निवडून भक्षिजे ॥८६॥
खोट्यांतून खरें निवडे ॥ कीं तांदुळांतून काढिले खडे ॥
हिऱ्यांमधूनि गारतुकडे ॥ परीक्षक निवडती ॥८७॥
तैसी भूतावळी निश्चिती ॥ राक्षसकलेवरें भक्षिती ॥
सागरीं भिरकाविल्या समस्त अस्ति ॥ न उरे क्षितीं कांहींच ॥८८॥
पीयूषवृष्टि होतां अपार ॥ उठिले अवघेही वानर ॥
ऐसें ऐकतां प्रत्युत्तर ॥ श्रोते पंडित सुखावती ॥८९॥
म्हणती वक्ता होय अति चतुर ॥ शोधकदृष्टी तुझी अपार ॥
संशय निरसला समग्र ॥ अंधार सूर्योदयें ॥१९०॥
ग्रासांमाजी हरळ काढून ॥ पुढें चाले जैसे भोजन ॥
तैसा संशय निरसला पूर्ण ॥ अनुसंधान ऐका पुढें ॥९१॥
रघुनाथ म्हणे बिभीषणा ॥ आतां आम्हांस देई आज्ञा ॥
ऐसें बोलतां रामराणा ॥ बिभीषण दाटला गहिंवरें ॥९२॥
तो नूतन लंकानाथ ॥ स्फुंदस्फुंदोनि तेव्हां रडत ॥
श्रीरामचरणीं मिठी घालित ॥ पद क्षाळित नयनोदकें ॥९३॥
म्हणे लंकाराज्य मज देऊन ॥ श्रीरामा तूं जातोसी टाकून ॥
अनंत राज्य ओंवाळून ॥ चरणावरूनि टाकावीं ॥९४॥
तुझिया भजनावरून ॥ मोक्ष सांडावा ओंवाळून ॥
तेथें लंकेचे राज्य तृण ॥ मज काय हे करावें ॥९५॥
मी अयोध्येसी येईन सांगातें ॥ सेवा करून राहीन तेथें ॥
ऐसें बोलतां रघुनाथें ॥ हृदयी धरिलें बिभीषणा ॥९६॥
प्राणसखया तुझे हृदयीं ॥ मी वसतों सर्वदाही ॥
परी तूं अयोध्येस येईं ॥ समागमें बोळवित ॥९७॥
अयोध्येचा सोहळा पाहून ॥ तूं आणि मित्रनंदन ॥
मग तेथून परता दोघेजण ॥ आपापल्या राज्यांसी ॥९८॥
परम संतोषे बिभीषण ॥ आणविलें पुष्पकविमान ॥
अत्यंत विशाळ गुणगहन ॥ आज्ञा पाळीन प्रभूची ॥९९॥
चंद्राहूनि प्रभा अत्यंत ॥ मुख्य सिंहासन विराजत ॥
दिव्य नवरत्‍नीं मंडित ॥ झालर शोभत मुक्तांची ॥२००॥
पृथ्वी सांठवे संपूर्ण ॥ ऐसें क्षणें होय विस्तीर्ण ॥
इच्छा होतांचि संकीर्ण ॥ धाकुटें होय तेव्हांचि ॥१॥
ऐसें विमान ते काळीं ॥ सेवकें आणिलें रामाजवळी ॥
तर्जनी लावूनियां भाळीं ॥ रघुत्तमें वंदिले ॥२॥
सीतेची अंगुली धरून ॥ दिव्य हिर्‍यांचे सोपान ॥
त्याचि मागें रघुनंदन ॥ वरी चढला ते काळीं ॥३॥
सीतेसमवेत रघुनाथ ॥ मुख्य सिंहासनी बैसत ॥
अष्टादशपद्में समस्त ॥ वानर वरी चढिन्नले ॥४॥
छप्पन्न कोटी गोलांगूल ॥ बाहात्तर कोटी रीस सकळ ॥
बिभीषणाचें असंख्य दळ ॥ वरी आरूढलें तेधवां ॥५॥
अष्टादश महाअक्षौहिणी ॥ लागली वाद्यांची ध्वनी ॥
अष्ट जुत्पती अष्ट कोणीं ॥ राघवापाशीं उभे राहिले ॥६॥
मृगांकवर्ण चामरे घेऊन ॥ अंगद आणि लक्ष्मण ॥
वरी विराजती दोघेजण ॥ समसमान दोहींकडे ॥७॥
असो आतां रघुनाथ ॥ लक्षूनियां अयोध्येचा पंथ ॥
राजाधिराज समर्थ ॥ जाता झाला ते काळीं ॥८॥
रामविजय रत्‍नखाणीं ॥ उत्तरकांड हे मुकुटमणि ॥
पुढें श्रवण करावें सज्जनीं ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९॥
ब्रह्मानंद यतीश्वर ॥ पूर्णज्ञानाचा समुद्र ॥
त्याच्या चरणाब्जीं श्रीधर भ्रमर ॥ अभंग रुंजी घालितसे ॥२१०॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥
सदा परिसोत पंडित चतुर ॥ चतुस्त्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२११॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय पस्तिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
देहबुद्धिलंका घेऊन ॥ मारिला अहंकृति रावण ॥
स्थापूनि भाव बिभीषण ॥ छत्र धरिलें तयावरी ॥१॥
ज्ञानकळा जनकतनया ॥ भेटली येऊन रघुराया ॥
मग स्वानंदविमानीं बैसोनियां ॥ आत्माराम चालिला ॥२॥
लागला वाद्यांचा गजर ॥ राघवकीर्ति गाती वानर ॥
योजनें दोन सहस्र ॥ विमान तेव्हां उंचावलें ॥३॥
जैसा पोर्णिमेचा रोहिणीवर ॥ पश्चिमेस जाय सत्वर ॥
कीं समुद्रीं जहाल थोर ॥ लोटित समीर वेगेंसी ॥४॥
तैसें वेगीं जात विमान ॥ घंटा वाजती घणघण ॥
दिव्यमणिमयप्रभा घन ॥ उत्तरपंथें जातसे ॥५॥
ऐसा जात रविकुळमंडण ॥ जो असुरकुळकानन -दहन ॥
वामांगीं अवनिजागर्भरत्‍न ॥ सौदामिनी मेघीं जैसी ॥६॥
तयेप्रति बोले रघुनंदन ॥ कांते खाली पाहें विलोकून ॥
लंका दिसे दैदीप्यमान ॥ हेमवर्ण विशाळ ॥७॥
पैल पाहें निकुंभिला ॥ येथें शक्रजित सौमित्रें मारिला ॥
आम्ही राहिलों होतों तेच सुवेळा ॥ प्राणवल्लभें विलोकी ॥८॥
पैल पाहे रणमंडळ ॥ येथें युद्ध जाहलें तुंबळ ॥
आटिले राक्षस सकळ ॥ महासबळ पराक्रमी ॥९॥
वज्रदंष्ट्री विरूपाक्ष अकंपन ॥ मत्त महामत्त प्रहस्त प्रधान ॥
भयानक विशाळ कुंभकर्ण ॥ येथेंच आटले इंदुवदने ॥१०॥
देवांतक नरांतक महोदर ॥ कुंभ निकुंभ त्रिशिरा महाअसुर ॥
ते येथें आटले समग्र ॥ जनकतनये पाहें पां ॥११॥
युद्ध करूनि सप्त दिन ॥ येथेंच पडला दशवदन ॥
हा समुद्र पाहें विलोकून ॥ सेतु नळें बांधिला ॥१२॥
पैल उत्तरतीरीं दर्भशयन ॥ येथें समुद्र भेटला येऊन ॥
पुढें मलयाचळ विंध्याद्रि पूर्ण ॥ किष्किंधा पाहें राजसे ॥१३॥
पैल पाहे पंपासरोवर ॥ येथें भेटला वायुकुमर ॥
पैल स्थळीं वाळिवीर ॥ सुग्रीवकैवारें वधियेला ॥१४॥
येथें शबरीचा केला उद्धार ॥ येथें कबंध वधिला साचार ॥
पैल दिसे गोमतीतीर ॥ खर दूषण वधिले येथें ॥१५॥
पुढें पंचवटी पाहें गजगमनें ॥ तेथूनि तुज नेलें द्विपंचवदनें ॥
ऋषीचें आश्रम पद्मनयने ॥ पाहं गौतमीतटींचे ॥१६॥
शरभंग सुतीक्ष्ण मंदकर्णीं ॥ हा सिंहाद्रि राजसे पाहें नयनीं ॥
येथें दत्तात्रेय अनुसूया अत्रिमुनि ॥ भेटलीं होती पाहे पां ॥१७॥
हा अगस्तीचा आश्रम पाहें ॥ पुढें चित्रकूटी दिसताहे ॥
भारद्वाजआश्रम जनकतनये ॥ पुढें तीर्थराज प्रयाग ॥१८॥
पैल नंदिग्राम दिसत ॥ तेथें प्राणसखा आहे भरत ॥
पैल शृंगेवरीं महाभक्त ॥ किरात गुहक वसतसे ॥१९॥
खंजनाक्षी पाहें सदर ॥ शरयूतीरीं अयोध्यानगर ॥
घवघवीत परम सुंदर ॥ वास्तव्य स्थळ आमुचें ॥२०॥
परमस्नेहादरेंकरूनी ॥ जानकीस दावी चापपाणी ॥
तों अगस्तीचे आश्रमीं मोक्षदानी ॥ क्षणएक राहूं इच्छित ॥२१॥
रामें आज्ञापितां विमान ॥ खालीं आलें न लगतां क्षण ॥
पद्माक्षीरमण तेव्हां वचन ॥ पद्माक्षीरप्रति बोलत ॥२२॥
आम्हां भेटेल घटोद्‌भवमुनि ॥ तुज लोपामुद्रा नेईल सदनीं ॥
आणिकही ऋषिपत्‍न्या मिळूनी ॥ तुज पुसतील साक्षेपे ॥२३॥
रावणें तुज नेले कैसे रीतीं ॥ कैसा लंकेसी आला रघुपति ॥
पुसेल कुंभसंभवसती ॥ कथा जैसी जाहल ते ॥२४॥
सांगे सकळ वर्तमान ॥ परी जें केलें सागर बंधन ॥
ही कथा तियेलागून ॥ सर्वथाही सांगू नयेचि ॥२५॥
हे कथा सांगशील पूर्ण ॥ तुज ती आणील हीनवण ॥
ऐसे सांगोन राघवें विमान ॥ ऋषिआश्रमीं उतरिले ॥२६॥
होतसे वाद्यांचा गजर ॥ दणाणलें तेणें अंबर ॥
शिष्य धांवून सत्वर ॥ अगस्तीप्रति सांगती ॥२७॥
स्वामी विमान आलें पृथ्वीवरी ॥ भरलें रीसवानरीं ॥
तों अगस्ति उठिला झडकरी ॥ म्हणे रघुवीर पातला ॥२८॥
मग शिष्य घेऊन अपार ॥ रामासी सामोरा जाय सत्वर ॥
लवलाहीं आश्रमाबाहेर ॥ कलशोद्‌भव पातला ॥२९॥
ऋषिमेळा राम देखतां ॥ उतरला विमानाखालता ॥
पुढें येतां कमलोद्‌भवपिता ॥ कलशोद्‌भवे देखिला ॥३०॥
अगस्तीस न धरवें धीर ॥ भूमंडळ क्रमीत सत्वर ॥
तंव रघूत्तमें नमस्कार ॥ साष्टांग घातला ऋषीतें ॥३१॥
अगस्तीनें धांवोनि त्वरित ॥ हृदयीं धरिला रघुनाथ ॥
जैसा वाचस्पति आलिंगित ॥ शचीवरासी आदरें ॥३२॥
सवेंच सौमित्रासी दिधलें आलिंगन ॥ तों रघूत्तम बोले हांसोन ॥
आजि आश्रम सोडून ॥ कां स्वामी आलेत बाहेरी ॥३३॥
मागें अरण्यकांडीं कथा गहन ॥ सीता घेऊनि गेला द्विपंचवदन ॥
तेव्हां परतोन रामलक्ष्मण ॥ अगस्तिआश्रमा पैं आले ॥३४॥
ते वेळीं अगस्तीनें जाणोन ॥ घेतले नाहीं रामदर्शन ॥
परतविलें दारींहून ॥ दोघे दशरथी ते काळीं ॥३५॥
ती गोष्ट आठवूनि रघुपति ॥ म्हणे तोच मी राम तूं अगस्ति ॥
तैं अनादर आतां प्रीति ॥ विशेष दिसे विप्रोत्तमा ॥३६॥
ऐसें बोलता सीताधव ॥ प्रत्युत्तर देत कलशोद्‌भव ॥
तैं स्त्रीरहित तूं राघव ॥ नाहीं वैभव तेधवां ॥३७॥
तो विपरीत काळ जाणोन ॥ नाहीं घेतले तुझे दर्शन ॥
आतां तूं स्त्रीयुक्त सीतारमण ॥ आलों म्हणोन सामोरा ॥३८॥
स्त्रीस अवघे देती मान ॥ तूं निर्विकार रघुनंदन ॥
मानापमानाविरहित जाण ॥ सच्चिदानंद परब्रह्म तूं ॥३९॥
तूं अज अजित आप्तकाम ॥ निरुपाधिक निर्गुण अनाम ॥
नाना विकार सम विषम ॥ स्त्रीचे सर्वही राघवा ॥४०॥
ऐकोनि अगस्तीचें उत्तर ॥ आनंदमय झाला रघुवीर ॥
मग आश्रमाप्रति सीतावर ॥ कलशोद्‌भव नेता जाहला ॥४१॥
तों ते लोपमुद्रा येऊन ॥ जनकजेसी करीं धरून ॥
गेली आश्रमांत घेऊन ॥ करूनि पूजन पुसतसे ॥४२॥
विदेहहतनये तुजसी प्रीती ॥ अत्यंत करितो रघुपती ॥
किंवा विरक्त असे चित्तीं ॥ सांग स्थिति कैसी ते ॥४३॥
वनीं विचरतां रघुनंदन ॥ तोषवीत असें की तुझें मन ॥
तूं भागलीस म्हणोन ॥ समाधान करितो कीं ॥४४॥
याउपरी विदेहराजनंदिनी ॥ त्रिभुवनपतीची पट्टराणी ॥
श्रीरामप्रताप वाखाणी ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥४५॥
म्हणे परम दयाळु रघुनाथ ॥ मजवरी स्नेह करी अत्यंत ॥
तूं म्हणसी स्त्रीलंपट बहुत ॥ जनकजामात तैसा नव्हे ॥४६॥
तरी अत्यंत दयाळु श्रीराम ॥ मजवरी स्नेह करी परम ॥
विरक्त सदा निष्काम ॥ रूप नाम नाही तया ॥४७॥
मज घेऊन गेला रावण ॥ दयासागर तो रघुनंदन ॥
करूनियां नाना प्रयत्‍न ॥ मज सोडविलें श्रीरामें ॥४८॥
तों लोपामुद्रा म्हणे सीते ॥ तुज कैसे नेलें लंकानाथें ॥
मग येऊन जनकजामातें ॥ सोडविलें कवणें रीतीं ॥४९॥
हर्षें सांगतसे जानकी ॥ म्यां इच्छिली मृगकंचुकी ॥
तें जाणोनि एकाएकीं ॥ अयोध्याप्रभु धांविन्नला ॥५०॥
मागें अतीथवेषें येऊन ॥ मज घेऊन गेला रावण ॥
माझिया वियोगें राम आपण ॥ वृक्षपाषाण आलिंगी ॥५१॥
मजनिमित्त राजीवनेत्र ॥ मित्र करोन चंडांशुपुत्र ॥
शक्रसुता वधोनि सर्वत्र ॥ कपिवीर सखे केले ॥५२॥
मग लोकप्राणेशनंदन ॥ धाडिला माझे शुद्धिलागोन ॥
तेणें जाळून लंकाभुवन ॥ रघुनंदन आणिला ॥५३॥
अष्टादशपद्में वानर ॥ संगें घेऊन आला श्रीरामचंद्र ॥
वेढूनियां लंकापुर ॥ युद्ध अपार पैं केलें ॥५४॥
संततीसमवेत ॥ रावण ॥ रणीं मारी रविकुळभूषण ॥
राज्यीं स्थापोनियां बिभीषण ॥ पुष्पकारूढ मग जाहले ॥५५॥
खालीं मी जों विलोकीं पूर्ण ॥ तंव अद्‌भुत केलें सेतुबंधन ॥
लंबायमान शतयोजन ॥ आणोनि पाषाण बांधिला ॥५६॥
समुद्र बांधिला पाषाणीं ॥ आश्चर्य मज वाटलें मनी ॥
हें जानकीनें विसरूनि ॥ सेतुचरित्र कथियेलें ॥५७॥
तों ते लोपामुद्रा बोलत ॥ काय सांगसी गोष्टी अद्‌भुत ॥
पाषाणीं बांधिला सरितानाथ ॥ काय पुरुषार्थ केला हा ॥५८॥
टाकूनियां एक शर ॥ कां शोषिला नाहीं सागर ॥
न लागतां क्षणमात्र ॥ माझे पतीनें प्राशिला ॥५९॥
ऐसें अगस्ति जाया बोलतां ॥ क्षणैक होय तटस्थ सीता ॥
म्हणे इणे उणे आणिलें रघुनाथा ॥ उत्तर आतां ईस देऊं ॥६०॥
म्हणे रघुत्तमाचा जातां बाण ॥ सप्त समुद्र जातील आटून ॥
बिंदुमात्र नुरे जीवन ॥ जीव संपूर्ण मरतील ॥६१॥
रामापासीं वानरगण ॥ आहेत परम बळेंसंपन्न ॥
सप्त समुद्रांचें आचमन ॥ एकदांच करितील ॥६२॥
म्हणसी का केलें नाही आचमन ॥ तरी तुझ्या पतीचे मूत्र पूर्ण ॥
न शिवती वानरगण ॥ मग प्राशन केवीं करतील ॥६३॥
रघुनाथदास सोंवळे बहुत ॥ म्हणोनि तिहीं बांधिला सेत ॥
नाहींतरी सरितानाथ ॥ प्राशावया क्षण न लागता ॥६४॥
ऐसें बोलतां जनकतनया ॥ उगीच राहीली ऋषिजाया ॥
असो जानकीची पूजा करूनियां ॥ संतोषविलें ते काळीं ॥६५॥
अगस्तीनें पूजोनि रघुनंदना ॥ सवेंच ऋषींची घेऊनि आज्ञा ॥
पुष्पकीं बैसे आयोध्याराणा ॥ सीतेसहित ते काळीं ॥६६॥
पुष्पक उचलिलें तेथूनि ॥ चलिलें अयोध्यापंथ्ज्ञ लक्षोनि ॥
तों भारद्वाजआश्रमीं येऊनि ॥ उतरलें तेव्हां प्रयागीं ॥६७॥
मनांत विचारी रघुनंदन ॥ घ्यावें भारद्वाजदर्शन ॥
यालागीं उतरलें विमान ॥ इच्छा जाणून प्रभूची ॥६८॥
भारद्वाजासहित अपार ॥ चहूंकडून धांवती मुनीश्वर ॥
जैसें महानद्यांचे पूर ॥ सिंधूस जाती भेटावया ॥६९॥
रघुत्तमें खालतें उतरून ॥ नीमले समस्त ऋषिजन ॥
भारद्वाजें दिधलें आलिंगन ॥ प्रेमेंकरून तेधवां ॥७०॥
म्हणे आजि धन्य दिवस ॥ घरा आला अयोध्याधीश ॥
जाहलीं वर्षें चतुर्दश ॥ चवदा दिवस अधिक पैं ॥७१॥
भारद्वाजें लक्ष्मण ॥ आलिंगिला प्रीतींकरोन ॥
ते दिवशीं रघुनंदन ॥ आपुले आश्रमीं राहविला ॥७२॥
मग तो जगदात्मा रघुनाथ ॥ स्नेहें हनुमंतासी सांगत ॥
म्हणे आम्ही आजि राहिलो येथ ॥ प्रीतीस्तव ऋषीच्या ॥७३॥
तरी पुढें जाऊनि त्वरित ॥ भरताप्रति करावें श्रुत ॥
शृंगवेरीं गुहक भक्त ॥ त्यासी हे विदित करावें ॥७४॥
ऐसी आज्ञा होतांचि पूर्ण ॥ वंदोनियां रघुवीरचरण ॥
वायुसुतें केले उड्डाण ॥ पित्याहून चपळत्वें ॥७५॥
गगनींहूनि अर्क उतरत ॥ तैसा गुहाकाश्रमीं हनुमंत ॥
येऊनि बोले अकस्मात ॥ अयोध्यानाथ आला कीं ॥७६॥
जो जगदानंद मूळकंद ॥ भरतहृदयारविंदमिलिंद ॥
रघुनाथ भक्तजनवरद ॥ जवळी आला जाणिजे ॥७७॥
परमानंद उदारघन ॥ अंतरंग मनमोहन ॥
परात्पर सोयरा जाण ॥ तो जवळीं आला कीं ॥७८॥
विश्वात्मक विश्वपाळक ॥ विश्वमनउदारक ॥
जनहृदयचाळक ॥ तों जवळी आला कीं ॥७९॥
ऐसें गुहके ऐकतां वचन ॥ वोसंडला आनंदेकरून ॥
धांवोनियां मारुतीचे चरण ॥ धरिले सद्रद होऊनियां ॥८०॥
ओळखोनियां परम भक्त ॥ त्यास हृदयी धरी हनुमंत ॥
गुहक मागुती लोळत ॥ चरणावरती मारुतीच्या ॥८१॥
म्हणे हें तन मन धन ॥ ओंवाळावें तुजवरून ॥
मग फळें सुमनें आणोन ॥ हनुमंत पूजिला गुहकें ॥८२॥
गुहकासी म्हणे हनुमंत ॥ चला नंदिग्रामासीं त्वरित ॥
स्वामी आला हें करूं श्रुत ॥ भरतप्रति जाऊनियां ॥८३॥
दोघेही उठिले ते क्षणीं ॥ एकमेकांचा हस्त धरूनि ॥
दोघेही भक्तशिरोमणि ॥ वेगेंकरूनि जाती ते ॥८४॥
तों नंदिग्रामीं भरत ॥ बोटानें दिवस मोजित ॥
म्हणे आतां न ये रघुनाथ ॥ चतुर्दश वर्षें लोटली ॥८५॥
भरत सर्वगुणी संपन्न ॥ तो भजनसमुद्रींचा मीन ॥
कीं वैरागरींचा पूर्ण ॥ अमोलिक मणि हा ॥८६॥
विवेकगंगेचा लोट थोर ॥ कीं ज्ञानाकाशींचा भास्कर ॥
कीं क्षमा धरिता सहस्रवक्र ॥ कीं सरोवर निश्चयाचें ॥८८॥
ऐसा तो भरत ते वेळीं ॥ म्हणे यावयाची सीमा जाहली ॥
राम प्रेमळाची माउली ॥ अजूनि दृष्टीं पडेना ॥८९॥
आतां हा देह टाकून ॥ धुंडीत जाईन रघुनंदन ॥
तत्काळचि कुंड रचून ॥ चेतविला अग्न कैकयीसुतें ॥९०॥
मग पाहिला दोन प्रहर ॥ अग्नींत घालावया शरीर ॥
सिद्ध जाहला भरत वीर ॥ परम प्रियकर रामाचा ॥९१॥
कुडासमीप उभा राहून ॥ अंतरीं आठविलें रामध्यान ॥
मुकुट कुंडलें आकर्ण नयन ॥ सुहास्यवदन सांवळे ॥९२॥
उडी घालावी जों आंत ॥ तों समीप जाला वायुसुत ॥
म्हणे आला आला रघुनाथ ॥ दशमुखांतक जगदात्मा ॥९३॥
आला सुरांचा कैवारी ॥ आला भक्तजनसाहाकारी ॥
भरत नेत्र उघडी तें अवसरीं ॥ तों मारुति घाली नमस्कार ॥९४॥
उष्णकाळ अत्यंत ॥ घायाळ रथ्ज्ञीं उदक मागत ॥
त्यासी जीवन पाविजे अकस्मात ॥ तैसा भरत सुखावला ॥९५॥
चकोर असतां क्षुधाक्रांत ॥ अवचित उगवे निशानाथ ॥
तैसा आनंदला भरत ॥ हनुमंतासी देखोनियां ॥९६॥
उचलोनियां परम प्रीतीं ॥ हृदयीं आलिंगिला मारुती ॥
म्हणे कोठें आहे रघुपति ॥ दावीं मज प्राणसखया ॥९७॥
प्राण जातां अमृत ॥ एकाएकीं घालिजे मुखांत ॥
तैसी शुभ वार्ता अकस्मात ॥ घेऊनि आलासी कपींद्रा ॥९८॥
मग हनुमंतासी बैसवून ॥ पुसिलें सकळ वर्तमान ॥
अमृतवर्षाव करीत घन ॥ तैसे येरें कथियेलें ॥९९॥
म्हणे कृपासिंधु रघुनंदन ॥ क्षणक्षणां तुमची आठवण ॥
करूनि म्हणे केव्हां जाईन ॥ भरताप्रति भेटावया ॥१००॥
धन्य तुमचे बंधुपण ॥ शक्रपदातुल्य राज्य टाकून ॥
सकळ मंगलभोग त्यजून ॥ नंदिग्रामीं बैसलां ॥१॥
भरत म्हणे हो मारुति ॥ मृगजीवनीं बुडेल अगस्ति ॥
तमार्णवीं पडेल दिनपति ॥ दोष भागीरथी जरी लिंपे ॥२॥
शेष जरी भागेल धरितां क्षिती ॥ जरी मर्यादा टाकील सरितापती ॥
तरी राज्यवासना मारुती ॥ मज होईल जाणा पां ॥३॥
असो शत्रुघ्नासी म्हणे भरत ॥ तूं अयोध्येसी जाई त्वरित ॥
वसिष्ठ मातादि समस्त ॥ तयासी श्रुत करा वेगीं ॥४॥
अरुणोदय होतां सत्वर ॥ प्रजा सेना घेऊनि समग्र ॥
जगद्वंद्यासी सामोर ॥ गजरेंकरून येइंजे ॥५॥
ऐसी आज्ञा होतां शत्रुघ्न ॥ अयोध्येसीं गेला धांवोन ॥
टवटवीत प्रसन्नवदन ॥ सुमंतासी भेटला ॥६॥
म्हणे पाहता काय उठा त्वरित ॥ जवळी आलें श्रीरघुनाथ ॥
नंदिग्रामीं आला हनुमंत ॥ पुढें सत्वर सांगावया ॥७॥
हर्षें धांवत सुमंत ॥ आनंद न माये गगनांत ॥
दुंदुभी त्राहाटिल्या त्वरित ॥ आला रघुनाथ म्हणोनियां ॥८॥
दणाणिल्या राजभेरी ॥ नाद न समाये अंबरी ॥
शत्रुघ्नें राजसदनावरी ॥ कळस चढविला लवलाहें ॥९॥
सूर्योदयीं अकस्मात ॥ पृथ्वीवरी किरणें धांवत ॥
तैसी नगरीं प्रकटली मात ॥ आला रघुनाथ म्हणोनियां ॥११०॥
आळोआळी जन धांवती ॥ आंगीं रोमांच उभे राहाती ॥
सुख न समायें तयां चित्तीं ॥ नयनीं लोटती प्रेमबिंदु ॥११॥
सोळा पद्में दळभार ॥ सिद्ध जाहले तेव्हां सत्वर ॥
कुंजरभेरी चवदा सहस्र ॥ एकसरें ठोकिल्या ॥१२॥
शत्रुघ्न आणि सुमंत ॥ आले कौसल्येच्या सदनांत ॥
म्हणती माते आला रघुनाथ ॥ सीतासौमित्रासहित पै ॥१३॥
कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ उचंबळल्या आनंदेकरूनी ॥
सुखाश्रु लोटले नयनीं ॥ बैसल्या वहनी सत्वर ॥१४॥
वसिष्ठापासीं जाऊन ॥ आनंदे सांगे शत्रुघ्न ॥
स्वामी आले जी रघुनंदन ॥ चला सत्वर सामोरे ॥१५॥
आला ऐकतां रघुनाथ ॥ स्वानंदें उचंबळे ब्रह्मसुत ॥
चतुरंग दळ समस्त ॥ नगराबाहेर निघालें ॥१६॥
विद्युत्प्राय ध्वज झळकती ॥ मकरबिरुदें पुढें चालती ॥
अष्टादश प्रजा धांवती ॥ नगराबाहेर सत्वर ॥१७॥
कैकयी सुमित्रा कौसल्या ॥ सुखासनारूढ जाहल्या ॥
मंगलवाद्यांच्या ध्वनि लागल्या ॥ तो सोहळा न वर्णवे ॥१८॥
वसिष्ठ शत्रुघ्न सुमंत ॥ दिव्य रथीं बैसले त्वरित ॥
आनंदमय जन समस्त ॥ श्रीरघुनाथ पहावया ॥१९॥
थोडीशी उरतां लग्नघडी ॥ वेगें धांवती वऱ्हाडी ॥
कीं गंगेचिया जवळीं थडी ॥ तृषाक्रांत करिती त्वरेनें ॥१२०॥
तैसें ब्रह्मानंदेकरून ॥ पुढें धांवती अयोध्येचे जन ॥
इकडे भरत सीताशोकहरण ॥ सूर्योदयीं उठियेले ॥२१॥
नित्यनेमातें सारून ॥ पुढें चालिले दोघेजण ॥
भरत म्हणे आजि धन्य नयन ॥ रामनिधान देखती ॥२२॥
इकडे भारद्वाजाची आज्ञा घेऊन ॥ पुष्पकीं बैसे रघुनंदन ॥
सत्वर चालिलें विमान ॥ अयोध्यापट्टण लक्षित ॥२३॥
तों भरतासी म्हणे हनुमंत ॥ ऊर्ध्वपंथें पाहा जी त्वरित ॥
भरत जों ऊर्ध्व विलोकित ॥ तों अद्‌भुत देखिलें ॥२४॥
भरत म्हणे हनुमंतासी ॥ हें काय असंभाव्य आकाशीं ॥
वाद्यें वाजती मानसीं ॥ आश्चर्य मज वाटतें ॥२५॥
हनुमंते म्हणे पुष्पकविमान ॥ सेनेसहित सीतारमण ॥
वरी येतात बैसोन ॥ परम वेगें करूनियां ॥२६॥
ऐसें सांगतां वायुनंदन ॥ भरतें घातलें लोटांगण ॥
मागुती ऊर्ध्व वदन करून ॥ पुनः विमान विलोकी ॥२७॥
मागुती साष्टांग नमस्कार ॥ प्रेमें घाली भरत वीर ॥
चंद्राकडे पाहे चकोर ॥ ऊर्ध्वपंथें प्रीतीनें ॥२८॥
मारुतीचा हस्त धरून ॥ पुढें चाले कैकयीनंदन ॥
तों राघवइच्छेकरून ॥ पुष्पक उतरलें भूमीवरी ॥२९॥
सीतेसहित रघुनंदन ॥ विमानाखालीं उतरून ॥
अयोध्येसी साष्टांग नमन ॥ राजीवनयन करी तेव्हां ॥१३०॥
जन्मभूमी जान्हवी जननी ॥ सद्रुरुस्थळ पवित्र अवनी ॥
शिवहरिप्रतिमा संत देखोनी ॥ साष्टांग नमन करावें ॥३१॥
तपस्वी वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण ॥ यज्ञप्रसाद ध्वज देखोन ॥
वंद्यद्रुम समाधिस्थान ॥ महापुरुष वंदावे ॥३२॥
सत्यव्रती श्रीरघुनाथ ॥ म्हणोनि अयोध्येसी नमस्कारित ॥
तों हनुमंतासमवेत ॥ जवळी भरत देखिला ॥३३॥
दाटला अष्टभावें करून ॥ घालीत येतसे लोटांगण ॥
श्रीरामवियोगेंकरून ॥ शरीर कृश जाहले ॥३४॥
भस्म लाविलें शरीरासी ॥ वल्कलें वेष्टित तो तापसी ॥
तैसा भरत देखोन मानसीं ॥ सीतावर कळवळला ॥३५॥
चरणीं क्रमीत भूमंडळ ॥ पुढें चाले तमालनीळ ॥
तान्हया वत्सालागीं स्नेहाळ ॥ धेनु हंबरत जैसी कां ॥३६॥
भरतें कैसें देखिले रघुनाथा ॥ बहुत दिवस गेला पिता ॥
तों कुमरें दृष्टीं देखतां ॥ धांवे जैसा स्नेहभरें ॥३७॥
तैसें भरतें धांवोनी ॥ मिठी घातली श्रीरामचरणीं ॥
की गेले धन देखतां नयनीं ॥ मिठी घाली जेविं लोभी ॥३८॥
कीं जन्मांधासी आले नयन ॥ कीं मृत्युसमयीं अमृतपान ॥
कीं दरिद्रीयास निधान ॥ अकस्मात प्राप्त जाहलें ॥३९॥
किंवा मारिता तस्करीं ॥ अकस्मात धांवला कैवारी ॥
तों जेविं सुखावे अंतरीं ॥ भरतासी तैसें वाटत ॥१४०॥
राघवें उचलूनि ते समयीं ॥ भरत दृढ धरिला हृदयीं ॥
दोघांचे नयनप्रवाही ॥ जलसरिता लोटल्या ॥४१॥
हरिहर दोघे भेटले ॥ शशिमित्र एकवट जाहले ॥
कीं क्षीराब्धीचे एवकटले ॥ लोट जैसे एकत्र ॥४२॥
कीं वेदांतग्रंथीचें अर्थ ॥ ऐक्यत्वा परस्परें येत ॥
तैसा दशमुखांतक आणि भरत ॥ एकपणें मिळाले ॥४३॥
सम संतोष समान प्रीति ॥ सोडावें हें न वाटे चित्तीं ॥
वियोगव्यथा दिगंतराप्रति ॥ जाती जाहली ते काळीं ॥४४॥
आलिंगन देऊन वेगळे होती ॥ परी अंतरीं नव्हेच तृप्ति ॥
तो सोहळा डोळां पाहती ॥ सुग्रीव आणि बिभीषण ॥४५॥
म्हणती भरत रघुपति ॥ अद्‌भुत दोघांची प्रीति ॥
एकास एक आवडती ॥ प्राणाहून पलिकडे ॥४६॥
बंधु साधु विरक्त भक्त ॥ चारी प्रकारें वंद्य भरत ॥
राज्य टाकूनि अरण्यांत ॥ चतुर्दश वर्षें बैसला ॥४७॥
नाहीं तरी आमुचें बंधुपण ॥ एकमेकांचे घेतले प्राण ॥
आतां रघुनाथ म्हणोन ॥ वंद्य जाहलों त्रिलोकीं ॥४८॥
परी धन्य वाळी आणि रावण ॥ त्यांचे विरोधप्रसंगेकरून ॥
सखा जोडला रघुनंदन ॥ सच्चिदानंदस्वरूप जो ॥४९॥
असो भरते प्रेमेंकरून ॥ वंदिले जनकजेचे चरण ॥
जैसें वत्स प्रीतीनें धांवोन ॥ रिघे धेनूचे कांसेसीं ॥१५०॥
यावरी भरत आणि लक्ष्मण ॥ उचंबळती प्रेमरसेंकरून ॥
एकमेकांसी आलिंगन ॥ देते जाहले तेधवां ॥५१॥
सुग्रीव आणि बिभीषण ॥ उभयतांसी म्हणे रघुनंदन ॥
भरतासी क्षेमालिंगन ॥ द्यावें आतां ते समयी ॥५२॥
ऐसें ऐकतां दोघेजण ॥ भरतासी करिती साष्टांग नमन ॥
सुग्रीवासी उठवून ॥ भरतें आधी आलिंगिलें ॥५३॥
सवेंचि उठोनि बिभीषण ॥ हृदयीं धरिला प्रीतीकरून ॥
यावरी नळ नीळ वाळिनंदन ॥ जांबुवंतादि भेटले ॥५४॥
याउपरी गुहक भक्त ॥ तोही भरताऐसा व्रतस्थ ॥
तेणें प्रेमभरें दंडवत ॥ केलें तेव्हां रामासी ॥५५॥
सर्वासी समान रघुनाथ ॥ गुहकास तेव्हां हृदयीं धरित ॥
आनंद न माय गगनांत ॥ गुहकाचा ते काळीं ॥५६॥
मग गुहक भरतासमवेंत ॥ विमानीं बैसला रघुनाथ ॥
विमानी मागुनी उंचावत ॥ चालिले अद्‌भुत वायुवेगें ॥५७॥
क्षीराब्धितटीं जाऊन ॥ बैसे जैसा विष्णुवहन ॥
नंदिग्रामासमीप विमान ॥ उतरले तैसे ते वेळीं ॥५८॥
सीता आणि श्रीरघुनाथ ॥ पुष्पकाखालीं उतरत ॥
वानर असुर समस्त ॥ क्षण न लागतां उतरले ॥५९॥
राघव म्हणे पुष्पकासी ॥ आतां तुवां जावें कुबेरापासीं ॥
चिंतिल्या समयासीं ॥ आम्हापासीं येइंजे ॥१६०॥
ऐसी आज्ञा होता तात्काळिक ॥ ऊर्ध्वपंथे गेलें पुष्पक ॥
धनपतीपासीं जाऊनि देख ॥ स्थिर जाहलें ते काळीं ॥६१॥
नंदिग्रामासमीप अरण्यांत ॥ उतरता जाहला रघुनाथ ॥
वानर असुरदळ समस्त ॥ सेना तेथें बैसली ॥६२॥
इकडे अयोध्येबाहेर ॥ निघालें जाण दळ परिकर ॥
रथ शृंगारिले सुंदर ॥ आनंदें बहुत चालिले ॥६३॥
चवदा सहस्र कुंजरभेरी ॥ दणाणिल्या ते अवसरीं ॥
सोळा पद्में दळेसी झडकरी ॥ शत्रुघ्न येत भेटावया ॥६४॥
भरत म्हणे जी रघुराया ॥ शत्रुघ्न सुमंत आले भेटावया ॥
आणि माताही येती लवलाह्या ॥ होऊनियां स्नेहभरित ॥६५॥
जो तपें ज्ञानें समर्थ ॥ जो शांतिक्षमेचा पर्वत ॥
तो वसिष्ठमुनि सद्‌गुरुनाथ ॥ भेटावया येत त्वरेनें ॥६६॥
आणि अयोध्येचे सकळ ब्रह्मण ॥ अष्टादश प्रजा सैन्य संपूर्ण ॥
असंभाव्यं प्रीतीकरून ॥ भेटावया येतसे ॥६७॥
तों सुमंत आणि शत्रुघ्न ॥ रथाखालीं उतरून ॥
अवलोकिता सीताजीवन ॥ लोटांगण घालिती ॥६८॥
देखोनि शत्रुघ्न सुमंत ॥ भेटावया उठे रघुनाथ ॥
शत्रुघ्न चरणीं मिठीं घालीत ॥ नेत्रीं उदक स्रवतसे ॥६९॥
रावणारि सद्द होऊन ॥ शत्रुघ्नासी देत आलिंगन ॥
तो सुमंते धरिले चरण ॥ चिषकंठवंद्याचें ते काळी ॥१७०॥
बंधूचे परी आदरे ॥ तोही आलिंगिला रघुवीरें ॥
परी प्रीती सौमित्रे ॥ सुमंत शत्रुघ्न आलिंगिले ॥७१॥
यावरी सकळ जुत्पती ॥ सुग्रीव बिभीषण नृपती ॥
सुमंत शत्रुघ्ना परम प्रीतीं ॥ भेटते जाहले तेधवां ॥७२॥
अवश्य सौभाग्यसरिता ॥ दोघांहीं वंदिली जनक दुहिता ॥
यावरी सुमंत म्हणे रघुनाथा ॥ सदगुरु वसिष्ठ समीप आले ॥७३॥
ऐसें बोलतां सुमंत ॥ सामोरा धांवे रघुनाथ ॥
तों वहानाखाली ब्रह्मसुत ॥ राम देखोनि उतरला ॥७४॥
नेत्रीं देखोनि सद्‌गुरुनाथ ॥ सद्द झाला जनजजामात ॥
॥ दंडन्यायें नमस्कार घालित ॥ धांवूनि वसिष्ठ उचली प्रेमें ॥७५॥
म्हणे जगद्वंद्या रघुनाथा ॥ तुझें दर्शन दुर्लभ समस्तां ॥
भूभार हरावया तत्वतां ॥ अवतरलासी सूर्यवंशी ॥७६॥
संसारभयश्रममोचना ॥ रावणांतका चिन्मयलोचना ॥
पुराणपुरुषा जगमोहना ॥ धन्य लीला दाविली ॥७७॥
मग बोले जगदात्मा ॥ सर्व तुमचे कृपेचा महिमा ॥
गुरुभक्तासी शिव ब्रह्मा ॥ सनकादिक वंदिती ॥७८॥
राग काळ भय मृत्य ॥ त्यांपासूनि रक्षी सद्‌गुरुनाथ ॥
देव केले बंधमुक्त ॥ हा प्रताप गुरुकृपेचा ॥७९॥
मग वसिष्ठ मुनीचे चरण ॥ वंदी प्रेमें सुमित्रानंदन ॥
त्यासी गुरुनें हृदयीं धरून ॥ म्हणे धन्य कीर्ति तुझी ॥१८०॥
त्यावरी वसिष्ठाचे चरण ॥ जानकी वंदी प्रमेंकरून ॥
गुरु म्हणे अनंत कल्याण ॥ सौभाग्यवर्धन तुझें हो कां ॥८१॥
जनकात्मजे तूं पूर्ण सती ॥ वाढविली राघवाची कीर्ति ॥
तूं प्रणवरूपिणी चिच्छिक्ति ॥ ब्रह्मांड रचिती स्वइच्छे ॥८२॥
असो सुग्रीव बिभीषणादि वीर ॥ करिती सद्‌गुरुसी नमस्कार ॥
तों माता आली सत्वर ॥ सुखासनीं बैसोनियां ॥८३॥
वहनापुढें वेत्रधार ॥ चालती सहस्रांचे सहस्र ॥
वहन आच्छादिलें समग्र ॥ हेमांबरेंकरूनियां ॥८४॥
सुमंत म्हणे रघुनाथा ॥ स्वामी जवळी आली माता ॥
तों धीर न धरवे सीताकांता ॥ सामोरा जात त्वरेनें ॥८५॥
वहन ठेलें भूमंडळी ॥ तों राघव धांवूनि आला जवळी ॥
जैसे तान्हे बाळ उडी घाली ॥ धेनु जवळी देखतां ॥८६॥
मातेचे चरणीं मस्तक ॥ ठेवी त्रिभुवननायक ॥
मायेनें उचलोन तात्कालिक ॥ हृदयीं धरिला ते काळीं ॥८७॥
नेत्रीं अश्रुधारा वाहात ॥ तेणें अभिषेकिला रघुनाथ ॥
स्नेहभरें माता स्फुंदत ॥ सद्द कंठ जाहला ॥८८॥
म्हणे चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ बाळें माझीं गेलीं वनांत ॥
सुकुमार चरणीं चालत ॥ शीतोष्ण सोशित पैं ॥८९॥
श्रीराम माझा राजहंस ॥ सोडोनि अयोध्यामानस ॥
पाठविला कंटकवनास ॥ सांवळा डोळस सुकुमार ॥१९०॥
माझा रामचंद्र निर्मळ ॥ वियोगराहु मध्यें सबळ ॥
चतुर्दश वर्षे शुद्ध मंडळ ॥ वदन आजि देखिला ॥९१॥
चतुर्दश वर्षें क्रमिली रजनी ॥ आजि राम उगवला वासरमणी ॥
अयोध्याजनवदनकमळिणी ॥ टवटविल्या एकदांचि ॥९२॥
नवमेघरंग रघुवीर ॥ वियोगसमीरें नेला दूर ॥
देहक्षेत्र शोषिलें समग्र ॥ आजिवरी आमुचें ॥९३॥
असो यावरी रघुनंदन ॥ करी मातेचें समाधान ॥
म्हणे भाग्य आमुचें परिपूर्ण ॥ देखिले चरण डोळां तुझें ॥९४॥
तों येऊनि लक्ष्मण ॥ वंदी कौसल्येचे चरण ॥
कौसल्येनें हृदयी धरून ॥ बोले वचन सद्द ॥९५॥
दोघे माझे चिंतामणी ॥ गोफणिले होते दूर वनीं ॥
पूर्वभाग्येंकरूनी ॥ पुढती नयनीं देखिले ॥९६॥
सुमित्रेचे चरण सप्रेमें ॥ वंदिले तेव्हां आत्मारामें ॥
हृदयीं आलिंगिला सप्रेमें ॥ सुमित्रेनें तेधवां ॥९७॥
म्हणे चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ अयोध्या जाहली होती प्रेतवत ॥
आजि निजप्राण रघुनाथ ॥ आंत संचरला ॥९८॥
असो सुमित्रेसी वंदून ॥ रामें कैकयीस केले नमन ॥
कौसल्येऐसें आलिंगन ॥ प्रीतीनें तेणें दिधलें ॥९९॥
कैकयी म्हणे रघुनाथा ॥ कल्याणरूपें नादें आतां ॥
अपयश आलें माझे माथां ॥ तें आजि सर्व निरसलें ॥२००॥
शुष्क कासारींचें मीन ॥ तळमळत होते अयोध्याजन ॥
तो आजि राम जगज्जीवन ॥ येऊनि भरलें एकसरें ॥१॥
इकडे सुमित्रेचे चरण ॥ साष्टांग नमी लक्ष्मण ॥
पुत्रास प्रेमें उचलून ॥ हृदयी धरी तेधवां ॥२॥
म्हणे चवदा वर्षें निराहार ॥ वनी श्रमलासी तूं थोर ॥
सौमित्र देत प्रत्युत्तर ॥ रघुवीरकृपेनें सुखी होतो ॥३॥
मग कैकयीस नमस्कार ॥ करीत भूधरावतार ॥
आलिंगोनियां सौमित्र ॥ म्हणे बारे विजयी होईं ॥४॥
यावरी कौसल्येचे चरणीं ॥ लागे येऊन मंगलभगिनी ॥
हृदयीं दृढ आलिंगोनी ॥ रामजननी बोलत ॥५॥
चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ माये श्रमलीस बहुत ॥
स्नेहे मुख कुरवाळीत ॥ जानकीचे तेधवां ॥६॥
नवरत्‍नमुद्रिका परम प्रीतीं ॥ घाली जानकीचें हातीं ॥
तों सीतेनें सुमित्रा सती ॥ परम स्नेहें नभियेली ॥७॥
सुमित्रा म्हणे वो साजणी ॥ परम श्रमलीस काननीं ॥
आपुले कंठींची माळ काढूनी ॥ गळां घातली जानकीच्या ॥८॥
स्नेहेंकरूनि धरिली हृदयीं ॥ मग सीतेनें वंदिली कैकयी ॥
क्षेम जो दिधलें नाहीं ॥ तों वचन काय बोलत ॥९॥
वय तुझें लहान साचार ॥ परी कीर्ति केली बहुत थोर ॥
रावणाची संपदा समग्र ॥ भोगूनियां आलीसी ॥२१०॥
श्रोत्रियाचें पात्र पूर्ण ॥ न कळतां घेऊनि गेलें श्वान ॥
तें श्वान मारिलें क्रोधेंकरून ॥ तरी पात्र ते पवित्र नोहेचि ॥११॥
तैसा राम रावण मारून ॥ तुज आणिलें सोडवून ॥
कोणे एके प्रकारेंकरून ॥ कीर्ति त्रिभुवनीं प्रकटलीं ॥१२॥
राम कष्टला वनवासीं ॥ परी तूं सुखें होतीस लंकेसी ॥
तेथींचा सोहळा मानसीं ॥ आठवत असेल तुझिया ॥१३॥
ऐसें कैकयी बोलतां ॥ उगीच परतून गेली सीता ॥
अपवित्रासी उत्तर देतां ॥ येत हीनता श्रेष्ठासी ॥१४॥
म्हणोनियां जनकबाळी ॥ जाऊनियां बैसली कौसल्येजवळी ॥
शांतीपासीं जैसी शोभली ॥ क्षमा निरंतर राहावया ॥१५॥
कीं आवडी तेथें भक्ती ॥ राहे जैसी परम प्रीतीं ॥
कीं धारणा तेथें वृत्ती ॥ न सोडीच सर्वथा ॥१६॥
तैसी कौसल्येपासीं सीता ॥ शोभली ती जगन्माता ॥
भाविक दुर्जना त्यागूनि तत्वतां ॥ संतसंगें जेवीं वसे ॥१७॥
रामविजयग्रंथ सुरस ॥ उत्तरकांड हाचि कळस ॥
त्यावरी अयोध्याप्रवेश ॥ सावकाश परिसिजे ॥१८॥
मंगलस्नान करून ॥ रघुवीर करील भोजन ॥
मग सुमुहूर्तेंसी संपूर्ण ॥ अयोध्येत प्रवेशती ॥१९॥
श्रीधरवरदा राघवेशा ॥ ब्रह्मानंदा पुराणपुरुषा ॥
अभंगपद निजदासा ॥ कृपा करून देईं तूं ॥२२०॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ पंचत्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२२१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय छत्तिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जो सद्‌गुरु आद्य निर्विकार ॥ जो ब्रह्मादिकांचे माहेर ॥
जो आदिमायेचा निजवर ॥ तो हा रघुवीर रविकुळीं ॥१॥
अनंत ब्रह्मांडांचा कर्ता ॥ जो प्रळयकाळाचा शासनकर्ता ॥
तो भरताग्रज तत्वतां ॥ नंदिग्रामीं राहिला ॥२॥
अयोध्येचे जन सकळ ॥ षोडशपद्में राजदळ ॥
सैन्य उतरलें तुंबळ ॥ नंदिग्राम वेष्टूनियां ॥३॥
अष्टादश पद्में वानरदळ ॥ बहात्तर कोटी रीस सबळ ॥
छप्पन्नकोटी गोलांगूळ ॥ उतरलें यथावकाशें ॥४॥
यावरी विश्रव्याचा सुत ॥ बिभीषण जो कां पुण्यपंडित ॥
त्याची असुरसेना अद्‌भुत ॥ श्रीरघुनाथभक्त उतरले ॥५॥
अष्टादश अक्षौहिणी वाजंत्रें ॥ बिभीषणाचीं गर्जती गजरें ॥
त्याहूनि अयोध्येची परिकरें ॥ अहोरात्र वाजती ॥६॥
शत्रुघ्न आणि सुमंत ॥ हेमांबरें शिबिरे बहुत ॥
उभीं करिते जाहले तेथ ॥ लक्षानुलक्ष ते काळीं ॥७॥
त्यांसी रत्‍नजडित स्तंभ ॥ वरी खचित कळस सुप्रभ ॥
त्यांच्या तेजेंकरूनि नभ ॥ उजळलें ते काळीं ॥८॥
सुग्रीव बिभीषणादि नृपवर ॥ आणिक कपिराज थोरथोर ॥
त्यांसीही शिबिरगृहे सविस्तर ॥ ठाव दीधला राहावया ॥९॥
कुळाचळांत मेरु थोर ॥ तैसे मुख्य श्रीरामाचे शिबिर ॥
मातागुरुबंधूंसह रघुवीर ॥ तेथें राहता पैं जाहला ॥१०॥
अंतरगृहीं सीता सती ॥ ऊर्मिला मांडवी श्रुतकीर्ती ॥
चवघी जावा तेथें राहती ॥ आनंद चित्ती न समाये ॥११॥
आला ऐकतां रघुवीर ॥ पातला जनकराज श्वशार ॥
संगें दळभार अपार ॥ वाद्यगजरें येतसे ॥१२॥
छप्पन्न देशींचे नृपती ॥ पावले तेव्हां शीघ्रगती ॥
सप्तद्वीपीं नवखंडी जे वसती ॥ धांवती करभार घेऊनियां ॥१३॥
धांवले सकळ ऋषीश्वर ॥ नानासाधनी व्रती थोरथोर ॥
योग याग टाकोनि समग्र ॥ येती रघुवीर पाहावया ॥१४॥
सप्त पुऱ्या गिरिकंदरीं ॥ नानातीर्थी गूढविवरीं ॥
वृक्षाग्रवासी वायुआहारी ॥ आसनें जयांची नानाविध ॥१५॥
शमदमादिक साधनें ॥ अष्टांगयोग देहदंडणें ॥
नाना हठयोग व्रताचरणें ॥ सांडूनि वेगीं धांवती ॥१६॥
तितुक्यांसही रघुनंदन ॥ उठोनि देत आलिंगन ॥
समस्तांसहित सीताजीवन ॥ वस्त्रमंडपी बैसला ॥१७॥
देहीं विदेही रघुवीर ॥ त्यासी भेटी आला विदेही श्वशुर ॥
तो जगन्मातेचा पिता मिथिलेश्वर ॥ पद्मजनकें आलिंगिला ॥१८॥
असो नर वानर नृपवर ॥ वसिष्ठादि सकळ ऋषीश्वर ॥
त्यांसी मंगलस्नान रघुवीर ॥ करविता जाहला ते काळीं ॥१९॥
लक्षानुलक्ष सुवर्ण कढया ॥ उष्णोदकें तापवूनियां ॥
सुगंध तैल लावूनियां ॥ मंगलस्नानें करवीतसे ॥२०॥
सर्वांसी वस्त्रें अलंकार ॥ नानारत्‍नभूषणें अपार ॥
देऊनियां जनकजावर ॥ रघुवीर सर्वां पाठवी ॥२१॥
बिभीषणादि सुग्रीव वानर ॥ मंगलस्नान करिती सत्वर ॥
अमौल्य वस्त्रें अलंकार ॥ स्वयें रघुवीरें दीधले ॥२२॥
वसिष्ठ नाहतांचि सत्वर ॥ अमौल्य वस्त्रें अलंकार ॥
स्वयें उठोनि रघुवीर ॥ देता जाहला आनंदे ॥२३॥
मणिमय पादुका आणून ॥ गुरुपुढें ठेवी रघुनंदन ॥
त्या वसिष्ठें पायीं घालोन ॥ मग बैसले स्वस्थानीं ॥२४॥
त्रयभगिनींसमवेव सीता ॥ अंतरगृहीं जगन्माता ॥
नाहोनियां समस्ता ॥ लेइल्या वस्त्रें भूषणें ॥२५॥
सकळ अयोध्यावासी जन ॥ नारीनर आदिकरून ॥
अवघ्यांसी गौरव समसमान ॥ जनजामातें दीधला ॥२६॥
मग बंधूंसहित रघुनंदन ॥ करिता जाहला मंगलस्नान ॥
तैल सुगंध लावून ॥ जटा उकलल्या मस्तकींच्या ॥२७॥
चवदा वर्षेंपर्यंत ॥ भरताकारणें धरिलें व्रत ॥
तें आजि विसर्जिले समस्त ॥ सीतावल्लभें तेधवां ॥२८॥
अभ्यंग जाहलिया समग्र ॥ सुमंतें वस्त्रें अलंकार ॥
आणोनियां सत्वर ॥ रघूत्तमासी समर्पिली ॥२९॥
जो लावण्यामृतसागर ॥ लेईला वस्त्र अलंकार ॥
भरतें पादुका सत्वर ॥ मस्तकींच्या पुढें ठेविल्या ॥३०॥
मग रघुनाथआज्ञेंकरून ॥ सौमित्र भरत शत्रुघ्न ॥
चौथा सुमंत प्रधान ॥ मंगलस्नान करिते जाहले ॥३१॥
संध्यादि नित्यकर्में सारिलीं ॥ तंव पाकनिष्पत्ति जाहली ॥
सकळ ऋषि नृप ते काळी ॥ भोजनासी बैसले ॥३२॥
बिभीषण सुग्रीव वायुनंदन ॥ नळ नीळ शरभ गंधमादन ॥
बंधूसहित रघुनंदन ॥ भोजनासी बैसले ॥३३॥
मणिमय कनकताटें शोभलीं ॥ रत्‍नखचित अडणियां तळीं ॥
उदकपात्रें भरूनियां ठेविलीं ॥ समसमान सर्वांसी ॥३४॥
रजताचळाऐसा के वळ ॥ तैसा भात वाढिला निर्मळ ॥
पंचभक्ष्यें परमात्रें सोज्जवळ ॥ शाखा साठी पत्रशाखा शोभती ॥३५॥
दधि मधु दुग्ध घृत ॥ शर्करा पंचामृत वाढित ॥
पंक्तीस जेथें रघुनाथ ॥ तेथें कांहीं न्यून नसे ॥३६॥
तीं अन्नें वर्णावीं समस्त ॥ तरी कां व्यर्थ वाढवावा ग्रंथ ॥
सकळ जीवांसहित रघुनाथ ॥ तृप्त जाहला भोजनीं ॥३७॥
हस्त प्रक्षाळून निर्मळ ॥ त्रयोदशगुणी तांबूल ॥
सर्वांसहित तमालनील ॥ घेता जाहला ते काळीं ॥३८॥
राम कोटिमन्मथतात ॥ तीन दिवस राहिला तेथ ॥
वसिष्ठें काढिला दिव्य मुहूर्त ॥ अयोध्याप्रवेश करावया ॥३९॥
पुष्यार्कयोग बहु सुभद्र ॥ रामचंद्रासी उत्तम चंद्र ॥
त्या सुमुहूर्ते गुणसमुद्र ॥ उठता जाहला तेधवां ॥४०॥
लागला वाद्यांचा गजर ॥ भेरी ठोकिल्या चौदा सहस्र ॥
बिभीषणाची वाद्यें समग्र ॥ वाजों लागलीं तेधवां ॥४१॥
बिभीषणसुग्रीवादि नृपती ॥ बैसले तेव्हां दिव्य रथी ॥
वाद्यगजरेंकरूनि क्षिती ॥ हालों लागली तेधवां ॥४२॥
दिव्यरथीं रघुनाथ ॥ बैसला तेव्हां सीतेसहित ॥
शत्रुघ्न आणि भरत ॥ चामरें वरी ढाळिती ॥४३॥
सहस्रांचे सहस्र वेत्रधार ॥ पुढें मार्ग करिती सत्वर ॥
नगरद्वाराजवळी रघुवीर ॥ पावता जाहला तें काळीं ॥४४॥
सप्त पुऱ्यांत अतिश्रेष्ठ ॥ अयोध्यापुरी हे वरिष्ठ ॥
सकळविद्यांमाजी सुभट ॥ अध्यात्मविद्या जैसी कां ॥४५॥
अयोध्येची रचनात ते क्षणी ॥ कपी असुर पाहती नयनीं ॥
देवराजपुरी उपमे उणी ॥ अयोध्येसी तुलितां पैं ॥४६॥
अयोध्येभोंवतें उपवन ॥ उपमेसी उणें नंदनवन ॥
वृक्ष सदा सुफळ संपूर्ण ॥ गेले गगन भेदित ॥४७॥
सूर्यकिरण न दिसे तळीं ॥ ऐसी सघनच्छाया पडिली ॥
कस्तूरीमृग सर्वकाळी ॥ क्रीडा करिती वनांत ॥४८॥
रावे साळया मयूर ॥ चातकें लावे तित्तिर ॥
नानापक्षी निरंतर ॥ रामनामें गर्जती ॥४९॥
स्फटिकनिबद्ध सरोवरें ॥ माजीं रातोत्पलें सुवासकरें ॥
राजहंस आनंदें थोरें ॥ क्रीडा करिती तये स्थानीं ॥५०॥
अयोध्येभोंवते दुर्ग पूर्ण ॥ उंच सतेज अतिगहन ॥
नागफणाकृति शोभायमान ॥ चर्चा त्यांवरी विकासती ॥५१॥
कीं ओळीनें जडले गभस्ती ॥ दुर्गावरी वृक्ष विराजती ॥
ते सदा फळीं निराळ भेदिती ॥ कपी पाहती समस्त ॥५२॥
जैसे कनकाद्रीचे सुत ॥ तैसें हुडे भोंवते विराजत ॥
महाद्वारें लखलखित॥ तेज अमित न गणवे ॥५३॥
ऐरावतारी देवपाळ ॥ बैसोन महाद्वारें जाईल ॥
तेवीं चोवीस योजनें विशाळ ॥ ओतप्रोत अयोध्या ॥५४॥
अयोध्येचा बाजार बहुत ॥ मृगमदाचा सुवास सुटत ॥
मठ मंडप चौबारा शोभत ॥ रत्‍नजडित अपूर्व ॥५५॥
हिरेयांच्या मदलसा झळकती ॥ वरी मुक्तांचे हंस नाचती ॥
पाचूचे रावे शब्द करिती ॥ घरोंघरी नवल हें ॥५६॥
वीणे टाळ मृदंग वाजवून ॥ लेपें करिती सुस्वर गायन ॥
रत्‍नपुतळ्या करिती नर्तन ॥ हस्तसंकेत दावूनियां ॥५७॥
शतखणी निर्मळ गोपुरें विशाळ ॥ खणोखणी पुतळ्या निर्मळ ॥
अणुमात्र लागतां अनिळ ॥ फिरफिरून नृत्य करिती ॥५८॥
अवतारलेपें रत्‍नजडित ॥ गोपुरांवरी सतेज झळकत ॥
उडुगणांसी हिणावित ॥ लक्षावधि चहूंकडे ॥५९॥
राजगृहीं अत्यंत सुप्रभ ॥ झळकती हिरीयांचे स्तंभ ॥
निळियांची उथाळीं स्वयंभ ॥ जोतीं घडलीं पाचूंची ॥६०॥
सुवर्ण तुळवट लंबायमान ॥ वरी पाचूचे दांडे सघन ॥
माणिकांच्या किलच्या संपूर्ण ॥ तेजेंकरून लखलखती ॥६१॥
अष्टमहा सिद्धि घरोघरीं ॥ नवनिधि तिष्ठती द्वारीं ॥
समानबुद्धि नरनारी ॥ पुण्यराहाटीं वर्तती ॥६२॥
मृत्यु रोग दरिद्र दुःख ॥ दुर्बुद्धि अवर्षण पाप शोक ॥
तस्कर कापट्य पीडा निंदक ॥ अयोध्येमाजी नसेचि ॥६३॥
छत्रासी एक दंड प्रसिद्ध ॥ सुमनहारासी गुंफितां बंध ॥
सारी खेळतां मारी सुबुद्ध ॥ शूरत्व युद्धीं जाणिजे ॥६४॥
घरासी न ये ऋषि भिक्षुक ॥ तरी लोकांस वाटे परम दुःख ॥
प्रजेसी साम्राज्य सुख देख ॥ देतील तेंच घेइजे ॥६५॥
त्रिकाळ गाई दुभती ॥ इच्छिलें तितुकें दुग्ध देती ॥
यथाकाळीं मेघ वर्षती ॥ समयोचित पाहूनियां ॥६६॥
धर्मशाळा मंडप विशाळ ॥ हिऱ्यांची लिंगें शोभती सोज्वळ ॥
आरक्त माणिकांच्या निर्मळ ॥ गणेशमूर्ति झगमगती ॥३७॥
घरोघरी वेदाध्ययन ॥ न्याय मीमांसा सांख्य संपूर्ण ॥
पतंजलि वेदांत व्याकरण ॥ हेच चर्चा होतसे ॥६८॥
टाळ मृदंग उपांगेसी तेथ ॥ कीर्तन करिती प्रेमळ भक्त ॥
राग उपराग भार्येंसहित ॥ सामगायन एक करिती ॥६९॥
लास्यकलाकुशल बहुत ॥ एक करिती तांडव नृत्य ॥
विद्युत्प्राय ध्वज तेथ ॥ देउळावरी झळकती ॥७०॥
चंदनाचे सडे घालूनी ॥ वाटा रंगविल्या कुंकुमेंकरूनी ॥
वृद्धदशा कोणालागूनी ॥ अयोध्येमाजी नसेचि ॥७१॥
नानातीर्थांचीं कारंजी बहुत ॥ घरोघरीं उफाळत ॥
नीळांचे मयूर धांवत ॥ बिदोबिदीं लवलाहें ॥७२॥
आळोआळीं पाहतां मंदिरें ॥ एकाहूनि एक सुंदरें ॥
गृहागृहा प्रति गोपुरें ॥ चित्रविचित्र शोभती ॥७३॥
असो ऐसी अयोध्या देखोन ॥ तटस्थ जाहले वानरगण ॥
तंव पूर्वद्वारें रघुनंदन ॥ अयोध्येच्या पातला ॥७४॥
महाद्वारीं गणेश सरस्वती ॥ त्यांची पूजा करून श्रीरघुपती ॥
आंत प्रवेशला त्वरितगती ॥ सकळ नृपांसहित पैं ॥७५॥
जैसा नद समुद्रीं मिळाला ॥ नंदनवनीं भ्रमर संचरला ॥
कीं चतुर्मुखाचे हृदयीं निघाला ॥ वेद जैसा षडंगेसी ॥७६॥
कीं वृत्रासुर मर्दून ॥ निजमंदिरीं प्रवेशे शचीरमण ॥
॥ तेवीं सकळांसहित रघुनंदन ॥ अयोध्येंत प्रवेशला ॥७७॥
देव अंबरी पाहती ॥ असंख्य दाटले नृपती ॥
किरीटास किरीट आदळती ॥ रत्‍नें विखुरती चहूंकडे ॥७८॥
त्या अयोध्येच्या समस्त नारी ॥ ज्या देवांगनांहूनि सुंदरी ॥
रत्‍नदीप घेऊनियां करीं ॥ ओंवाळूं आल्या रामातें ॥७९॥
लक्षानुलक्ष नगरललना ॥ म्हणती राघवा चिन्मयलोचना ॥
जयलाभ तुझिया चरणा ॥ जवळी अखंड असोत ॥८०॥
म्हणोनि आपुल्या गोपुरावरूनी ॥ ओंवाळिती सकळ कामिनी ॥
राकाइंदूहूनि वदनीं ॥ प्रभा विशेष विराजे ॥८१॥
त्यांकडे पाहून रघुनाथ ॥ सुमंतास भ्रूसंकेत दावित ॥
तो त्यासी समजला अर्थ ॥ जें कां हृद्‌गत रामाचें ॥८२॥
वस्त्रें अलंकार आणूनी ॥ तात्काळ गौरविल्या कामिनी ॥
तों नगरलोक धांवले ते क्षणीं ॥ मंडपघसणी जाहली ॥८३॥
तयांसी वेत्रधारी मारित ॥ ते दृष्टीं देखोन रघुनाथ ॥
तात्काळ परते केले दूत ॥ म्हणे जन सर्वत्र येऊं द्या ॥८४॥
आज्ञा होतांचि जाण ॥ जवळ आले सकळ जन ॥
पाहोनियां श्रीरामाचें वदन ॥ चरणीं मिठ्या घालिती ॥८५॥
लक्षोनियां श्रीरघुनाथा ॥ नारी टाकिती वरी अक्षता ॥
एक लिंबलोण तत्वतां ॥ मुखावरून उतरिती ॥८६॥
एक म्हणती तुजवरून ॥ राघवा जाऊं ओंवाळून ॥
एक म्हणती हें वदन ॥ पुनः दृष्टीं पडेना ॥८७॥
दिव्य सुमनांचे संभार ॥ वरोनी वर्षती सुरवर ॥
असो जगद्वंद्य रघुवीर ॥ निजमंदिरी प्रवेशला ॥८८॥
जाऊनि अंतर्गुहांत ॥ पुष्पांजली देवांस समर्पित ॥
राजयांच्या सेना समस्त ॥ अयोध्याप्रदेशीं उतरल्या ॥८९॥
अष्टदशपद्में वानर ॥ उतरले लंकेचे असुर ॥
तितुक्यांसी आदर उपचार ॥ सुमंत शत्रुघ्न करिताती ॥९०॥
बिभीषण सुग्रीव राजे सकळी ॥ ते सदा असती रामाजवळी ॥
वसिष्ठें सामग्री सिद्ध केली ॥ राज्यपदाची तेधवां ॥९१॥
श्वेत चामर श्वेत छत्र ॥ श्वेत गज श्वेत तुरंग थोर ॥
चतुःसमुद्रीचें आणिलें नीर ॥ पंच पल्लव सप्त मृत्तिका ॥९२॥
सभामंडप देदीप्यमान ॥ तेथें मांडिले दिव्य सिंहासन ॥
मिळाले सकळ विद्वजन ॥ आणि नृपती सर्वही ॥९३॥
वसिष्ठ म्हणे राजीवनयना ॥ जलजगात्रा जानकीजीवना ॥
जगद्वंद्या अनंतसदना ॥ राज्य आतां अंगिकारीं ॥९४॥
भरत सप्रेमें बोले ॥ चतुर्दश वर्षें तप केले ॥
तें आजि शीघ्र काळें ॥ सुफळ जाहलें पाहिजे ॥९५॥
सिंहासनी बैसावें आपण ॥ मग अक्षय भांडारें फोडून ॥
द्रव्य याचकांसी देईन ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९६॥
मग वसिष्ठें हातीं धरून ॥ मंडपा आणिला रघुनंदन ॥
सीतेसहित बैसवून ॥ अभिषेक केला वेदमंत्रीं ॥९७॥
घनश्याम पूर्ण रघुवीर ॥ तप्तकांचनवर्ण पीतांबर ॥
लेवविले दिव्य अलंकार ॥ मुकुट कुंडलें कौस्तुभादि ॥९८॥
जानकीसहवर्तमान ॥ सिंहासनीं बैसविला रघुनंदन ॥
सकळ भूपती येऊन ॥ अक्षता कपाळीं लाविती ॥९९॥
सुमुहूर्त वेळा साधून सत्वर ॥ वरी उभारिलें दिव्य छत्र ॥
तों सकळ वाद्यांचा गजर ॥ होता जाहला ते काळीं ॥१००॥
जाहला एकचि जयजयकार ॥ सुमनें वर्षती सुरवर ॥
सकळ राजयांनीं करभार ॥ राघवापुढें समर्पिला ॥१॥
सर्व नृप करूनि नमन ॥ उभे ठाकती कर जोडून ॥
भरतें भांडार फोडून ॥ याचकजन गौरविले ॥२॥
उदार धीर रघुवीर ॥ ज्याचा बंधु भरत वीर ॥
मोटा बांधूनि अपार ॥ द्रव्य न्याहो म्हणतसे ॥३॥
पुरे पुरे हेचि मात ॥ याचक बोलती समस्त ॥
हय गज रत्‍नें अद्‌भुत ॥ दिधले बहुत यांचकां ॥४॥
गोदानें भूदानें अपार ॥ जें वेदीं बोलिलें साचार ॥
तितकें देऊन द्विजवर ॥ सुखी केले ते काळीं ॥५॥
ऐसा षोडश दिनपर्यंत ॥ सोहळा होतसे अद्‌भुत ॥
कळापात्रें येऊन तेथ ॥ विद्या दावित रामापुढें ॥६॥
लक्ष्मण आणि भरत ॥ शत्रुघ्न आणि सुमंत ॥
सुवराज्य त्यांते देत ॥ श्रीरघुनाथ ते समयीं ॥७॥
वस्त्रें भूषणें देऊन ॥ चवघे मुख्य प्रधान ॥
तुमच्या अनुमतेंकरून ॥ राज्य चालवीन राम म्हणे ॥८॥
असो दिव्य अन्नें निर्मून ॥ सकळ रायांसी दिधलें भोजन ॥
वस्त्रालंकारी पूर्ण ॥ सेनेसहित गौरविले ॥९॥
मग श्रीरामाची आज्ञा घेती ॥ सेनेसहित सकळ नृपती ॥
स्वदेशाप्रति तेव्हां जाती ॥ गुण वर्णिती राघवाचे ॥११०॥
सुग्रीव आणि बिभीषणास ॥ रामें राहविलें एक मास ॥
नित्य भोजन पंक्तीस ॥ नानाविलास सोहळे पैं ॥११॥
सिंहासनीं बैसतां रघुनाथ ॥ बंधू भोंवतें आनंदभरित ॥
भक्तिरसें शत्रुघ्न भरत ॥ चामरें वरी वारिती ॥१२॥
तों गवाक्षद्वारें ते समयीं ॥ अवलोकिती जाहली कैकयी ॥
म्हणे त्रिभुवनीं शोधितां पाहीं ॥ अभागी नाही भरताऐसा ॥१३॥
चवदा वर्षें भिकारी ॥ जाऊनि बैसला वनांतरीं ॥
शेवटीं बंधूचें दास्य करी ॥ चामरें वरी वारितो ॥१४॥
माझे पूर्व पाप फळासी आलें ॥ ऐसें भरताची माता बोले ॥
वसिष्ठास बोलावून ते वेळे ॥ कैकयी सांगे एकांतीं ॥१५॥
म्हणे माझिया पोटी भरत ॥ दरिद्री जन्मला अत्यंत ॥
बंधूचें दास्य करित ॥ मज हें दुःख वाटतें ॥१६॥
मग बोले ब्रह्मसुत ॥ अजूनि तरी राहे निवांत ॥
ग्रासिला राजा दशरथ ॥ वना रघुनाथ धाडिला ॥१७॥
सच्चिदानंदन ब्रह्म पूर्ण ॥ तो हा अवतरला रघुनंदन ॥
मूर्खे तुज हे नाही ज्ञान ॥ अद्यापि कां कळेना ॥१८॥
जे ब्रह्मादिदेवांची ध्येय मूर्ति ॥ हृदयीं ध्यात अपर्णापती ॥
हृदयकमळीं वाहती ॥ सनकादिक प्रीतीनें ॥१९॥
पुराणपुरुष रघुनंदन ॥ त्याचे भजनीं लावीं मन ॥
आपली युक्ति ठेवीं झांकून ॥ नसतीं वचनें बोलू नको ॥१२०॥
तुजप्रति सांगावे ज्ञान ॥ जैसे काननामाजी रुदन ॥
कीं बधिरापुढें गायन ॥ लसणी कर्पूर घांसिला ॥२१॥
पुष्पवाटिकेंत पलांडु उपजला ॥ परी तो गुण न सांडी आपुला ॥
नित्य दुग्धें वायस धुतला ॥ परी कृष्णवर्ण नवजाय ॥२२॥
शर्करेचें आळें केलें ॥ माजी निंबबीज पेरिलें ॥
परी शेवटी कडू येती फळें ॥ व्यर्थ गेले कष्ट सर्व ॥२३॥
खापरास परिस घांसतां ॥ परी सुवर्ण नव्हेचि तत्वतां ॥
कीं दुग्धामाजी हरळ घालितां ॥ मवाळ नव्हे कल्पांतीं ॥२४॥
तैसें तुजप्रति जें जें शिकविलें ॥ तें तें सर्वही व्यर्थ गेले ॥
आतां स्वस्थ राहूनि उगलें ॥ चित्त ठेवीं रघुनाथीं ॥२५॥
ऐसें शिकवून तियेसी ॥ बाहेर आला वसिष्ठ ऋषि ॥
यावरी बिभीषणसुग्रीवांसी ॥ निरोप देतसे श्रीराम ॥२६॥
वानरांसी श्रीराम म्हणे ॥ भोजन करून गमन करणें ॥
ते केले मान्य वचन ॥ अवश्य म्हणती तेधवां ॥२७॥
ते दिवशीं मोठा सोहळा ॥ मेळवूनि द्विजांचा मेळा ॥
वानरांसहित सकळां ॥ भोजनविधि आरंभिला ॥२८॥
प्रेमाचिया गंधाक्षता ॥ लावी सर्वां सरसिजोद्‌भवपिता ॥
सुमनमाळा तत्वतां ॥ अर्पीत समस्तां आदरें ॥२९॥
चैतन्य परिमळद्रव्यें बहुत ॥ सर्वांस चर्चिलीं शोभिवंत ॥
उत्तर धूप दीप यथार्थ ॥ करूनि भोजना बैसविले ॥१३०॥
श्रीरामगृहीचें दिव्यान्न ॥ त्या सुवासालागीं ॥
वेधोन ॥ वसंत करी प्रदक्षिणा ॥ इच्छाभोजत तेथीचें ॥३१॥
त्या अन्नाचा सुवास बहुत ॥ स्वर्गीं देवांस आवंतूं जात ॥
विबुध लाल घोंटिती समस्त ॥ श्रीरामपंक्तीस जेवावया ॥३२॥
बैसावया सुवर्णपाट ॥ मांडिले दिव्यरत्‍नांचे ताट ॥
जडित अडणियांचे प्रकट ॥ दिव्य तेज चहूंकडे ॥३३॥
सुगंध उदकें भरूनियां ॥ जवळी ठेविल्या जडित झारिया ॥
पात्रांप्रति शोभती समया ॥ लावूनियां रत्‍नदीप ॥३४॥
प्रथम विश्वास संपूर्ण ॥ तेंच आधी वाढिले लवण ॥
विरक्तीचीं मिरगुंडें जाण ॥ नानासाधनें त्याचि शाखा ॥३५॥
सत्कर्मांचिया कोशिंबिरी ॥ वाढिल्या नवविधभक्तीचिया क्षीरी ॥
निश्चय शर्करा त्यावरी ॥ ऐसियापरी शुभ्र दिसे ॥३६॥
निजबोधचा भात पूर्ण ॥ अक्षय शांतीचें वरी वरान्न ॥
तेथें अभेद वडे करून ॥ नानापरीचें वाढिले ॥३७॥
पूर्णप्राप्तीचे मांडी थोर ॥ भूतकृपेच्या धारिया सुकुमार ॥
तेलवारिया गोडपुऱ्या अपार ॥ मिष्ट ऐसीं वाढिली ॥३८॥
सत्त्वघृतांत तळून ॥ गुळवरिया अंतरीं गोड पूर्ण ॥
क्षमाफेणिया शोभायमान ॥ समसमान सर्वांसी ॥३९॥
विवेकपापड चांगले ॥ वैराग्यअग्नीवरी भाजिले ॥
विज्ञान तेंचि अमृतफळें ॥ वाढिली केळें सत्वाची ॥१४०॥
सर्वांगभूती समता चोखडी ॥ तेच घमघमीत वाढिली कढी ॥
सज्जन जाणती तिची गोडी ॥ वेदांतशास्त्रवेत्ते जे ॥४१॥
मुख्य गुरुकृपेचें घृत ॥ त्याविणें अन्न विरस समस्त ॥
प्रेमेंकरून सद्यस्तप्त ॥ शुद्ध करीत अन्नातें ॥४२॥
जेवणार बसले सद्‌भक्त ॥ स्वानंदजळें पात्रें प्रोक्षित ॥
देहबुद्धीच्या चित्राहुति तेथ ॥ पात्राबाहेरी घातल्या ॥४३॥
सोहंगायत्री जपोनी ॥ देहबुद्धिनांवें सोडिले पाणी ॥
निवृत्ति आपोशन घेऊनी ॥ रामस्मरणें गर्जिले ॥४४॥
पंचप्राणांच्या प्राणाहुती ॥ योगाभ्यासें आधीं करिती ॥
शिखेची कामग्रंथि ॥ सत्वर सोडिती निजहस्तें ॥४५॥
निरभिमान संपूर्ण ॥ तेणेंच केले करक्षालन ॥
नेत्रांसी लाविलें जीवन ॥ जगज्जीवन सर्व दिसे ॥४६॥
श्रीरामभक्त क्षुधाक्रांत ॥ स्वाद घेऊनि प्रीतीनें जेवीत ॥
पद्मासन घालोनि निश्चित ॥ ग्रासामागें ग्रासी घेती ॥४७॥
भवरोगें जे वेष्टित ॥ नाही भावक्षुधा पोटांत ॥
ते टकमकां उगेच पाहात ॥ ग्रास एक न घेववे ॥४८॥
चंद्रोदयीं द्रवे सोमकांत ॥ इतर पाषाण कोरडे समस्त ॥
तैसे श्रीरामपंक्तीस जेविले भक्त॥ अभाग्यां प्राप्त कैचें तें ॥४९॥
ऐसी जेविती आनंदें ॥ नामें गर्जती महाशब्दें ॥
भावें चर्चा करिती ऋषि वेदें ॥ ज्याचे स्मरणेंकरूनियां ॥१५०॥
जे दैवी संपत्तीनें सभाग्य होती ॥ तेच रामपंक्तीस जेविती ॥
तृप्तीचे ढेंकर देती ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥५१॥
जे त्रिभुवनपतीची राणी ॥ वाढी जानकी त्रिजगज्जननी ॥
तेथें न्यून पदार्थांची काहाणी ॥ कदाकाळीं पडेना ॥५२॥
स्वानुभव जळ सेवून ॥ कर्मधर्माचे उत्तरापोशन ॥
घेऊनि उठले ते जन ॥ आंचवले पूर्ण संसारा ॥५३॥
अमानित्व अदंभित्व ॥ हे विडे घेती समस्त ॥
निजधन नाममुद्रांकित ॥ दक्षिणा देती याचकां ॥५४॥
भक्तीचीं भूषणें वस्त्रें ॥ सद्‌भक्तांसी दिधली राजीवनेत्रें ॥
तो सोहळा वर्णावया वक्रें ॥ सहस्रवदना शक्ति नोहे ॥५५॥
ऐसे स्वपंक्तीस बैसवून ॥ दिधलें सकळांसी भोजन ॥
मग सभामंडपास येऊन ॥ रघुनंदन गौरवी तयां ॥५६॥
मुकुट कुंडलें सर्व अलंकार ॥ आपण स्वयें देत रघुवीर ॥
तैसेचि इतर वानर ॥ गौरविले रघुनाथें ॥५७॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ त्यांच्या सेना ज्या ज्या समस्त ॥
तितुक्या गौरवी रघुनाथ ॥ वस्त्रें अलंकार देऊनियां ॥५८॥
दोन सिंहासनें दोन छत्रें ॥ बिभीषणसुग्रीवा दिधली राजीवनेत्रें ॥
दिधली कित्येक उत्तरवस्त्रें ॥ नानावस्तू अपार ॥५९॥
परी पुढें असे हनुमंत ॥ त्याकडे न पाहे रघुनाथ ॥
वानरगण पहाती समस्त ॥ विपरीतार्थ देखोनी ॥१६०॥
कां न पाहे रघुनंदन ॥ तरी हनुमंताऐसें निधान ॥
हें ब्रह्मांड ओंवाळून ॥ तयारून टाकावें ॥६१॥
ज्याच्या उपकारांच्या राशी अपार ॥ मेरूपरीस जाहल्या थोर ॥
त्यासी द्यावया अलंकार ॥ दृष्टीस कांही दिसेना ॥६२॥
मग उठोनिया रघुपति ॥ हृदयी दृढ धरी मारुति ॥
म्हणे तव हृदयीं निश्चितीं ॥ मीच सर्वदा राहेन ॥६३॥
तुजवेगळा एक क्षण ॥ जिवलगा मी नव्हे जाण ॥
हनुमंतें दृढ धरिले चरण ॥ म्हणे मज हेंचि देईं ॥६४॥
सीतेनें वस्त्रें अलंकार ॥ देऊनि गौरविले सकळ वानर ॥
परी आपुले गळ्याचा दिव्य हार ॥ हनुमंतासी दीधला ॥६५॥
त्या हारासी तत्वतां ॥ उपमा नाहीं सर्वथा ॥
त्रिभुवनींचे मोल देतां ॥ तेंही उणे तयासी ॥६६॥
पृथ्वीचे मोल संपूर्ण ॥ एक एक मणी जाण ॥
तो हार जानकीनें घेऊन ॥ मारुतीच्या गळां घातला ॥६७॥
हनुमंत तात्काळ उडाला ॥ वृक्षावरी समोर बैसला ॥
एक एक मणि फोडिला ॥ दाढेखालीं घालूनियां ॥६८॥
जो मणि पाहे फोडून ॥ म्हणे यांत नाहीं रघुनंदन ॥
म्हणोनि देतसे भिरकावून ॥ व्यर्थ पाषाण काय हे ॥६९॥
बोलती सुग्रीवादि वानर ॥ व्यर्थ कां फोडिसी दिव्य हार ॥
मारुती म्हणे रघुवीर ॥ याचे अंतरीं दिसेना ॥१७०॥
वानर म्हणती तुझे हृदयीं ॥ राम दावीं ह्या समयीं ॥
ऐसें बोलतां लवलाहीं ॥ काय केलें हनुमंतें ॥७१॥
हृदयकपाट उघडिलें ॥ उदर विदारून दाविलें ॥
ती आंत श्रीरामरूप सांवळे ॥ समस्ती देखिलें एकदांचि ॥७२॥
जैसा सिंहासनी रघुनाथ ॥ तैसा मारुतीचे हृदयी दिसत ॥
मग वानर उठोनि समस्त ॥ नमस्कारिती हनुमंता ॥७३॥
असो अयोध्येसी निरंतर ॥ राहिला अंजनीचा कुमर ॥
वरकड सिद्ध जाहले वानर ॥ निजग्रामासी जावया ॥७४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ तिहीं सुग्रीव बिभीषण ॥
वस्त्राभरणीं गौरविलें पूर्ण ॥ सदना आपुलें नेऊनियां ॥७५॥
कौसल्या सुमित्रेप्रति ॥ सुग्रीव बिभीषण पुसती ॥
म्हणे माता हो आम्हांवरी प्रीति ॥ असो द्यावी बहुसाल ॥७३॥
कौसल्या सुमित्रा बोलत ॥ बारे तुमचे उपकार अमित ॥
विजयी करून रघुनाथ ॥ माझा मज भेटविला ॥७७॥
अमोल्य अलंकार देऊन ॥ गौरविले ते दोघेजण ॥
मग सुग्रीव आणि बिभीषण ॥ कैकयीसदना चालिले ॥७८॥
तों आडवा येऊन भरत ॥ तिकडे न जावें जी म्हणत ॥
कैकयी विपरीत बोलत ॥ चित्त खेद पावेल तुमचें ॥७९॥
ऐसें भरतें बोलोन ॥ परतविलें सुग्रीव बिभीषण ॥
रघुनाथाजवळी येऊन ॥ आज्ञा मागती जावया ॥१८०॥
उभे राहिले जोडोनि कर ॥ सर्वांचे अश्रूंनी भरले नेत्र ॥
म्हणती राघवा निरंतर ॥ सर्वथा आम्हां न विसरावें ॥८१॥
त्रिभुवनींचे राज्य टाकावें ॥ रामा तुजजवळीच नित्य राहावें ॥
परी हें प्राक्तन नाही बरवें ॥ ओढून नेतें बळेचि ॥८२॥
काय आठवावे उपकार ॥ जन्मोजन्मीं न पडावा अंतर ॥
तुझे बोल गोड निरंतर ॥ राघवा हृदयीं आठवती ॥८३॥
स्फुंदस्फुंदोनि दोघजण ॥ बोलती सुग्रीव बिभीषण ॥
मग म्हणे रघुनंदन ॥ तुमच्या हृदयीं वसें मी ॥८४॥
मग उठोनियां रघुनाथ ॥ दोघांचे मस्तकीं ठेवी हस्त ॥
मग सव्य घालोनि सीताकांत ॥ निघते जाहले ते काळीं ॥८५॥
तयांसी बोळवीत रघुवीर ॥ गेला अयोध्येबाहेर ॥
मग सर्व वानरीं नमस्कार ॥ रघुनाथासी घातला ॥८६॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ नळ नीळ शरभ वाळिसुत ॥
इहीं साष्टांग नमूनि रघुनाथ ॥ जाते जाहले ते काळीं ॥८७॥
दक्षिणपंथें चालिले त्वरित ॥ मागुती राघवाकडे पाहात ॥
तेथून नमस्कार घालित ॥ सद्रद चित्ती होऊनियां ॥८८॥
मग पवनवेगेंकरून ॥ कपि असुर निघाले तेथून ॥
किष्किंधेस सूर्यनंदन ॥ राहिला कपींसमवेत ॥८९॥
तेणें बिभीषण गौरविला ॥ मग घेऊनि असुरमेळा ॥
रावणानुज लंकेसीं आला ॥ स्वस्थानीं स्वस्थ राहिला ॥१९०॥
इकडे अयोध्येसीं रघुनाथ ॥ बंधूंसहित राज्य करित ॥
पृथ्वी संपूर्ण आनंदभरित ॥ दुःख किंचित असेना ॥९१॥
अकरा सहस्र वर्षेवरी ॥ अयोध्यानाथ राज्य करी ॥
लोक सर्व धर्माधिकारी ॥ पाप तिळभरी असेना ॥९२॥
अवतार हरि उदंड धरी ॥ परी बहुत सुख रामावतारीं ॥
अकरासहस्र वर्षवरी अक्षय राज्य चालविलें ॥९३॥
जरा मृत्यु दुःख दरिद्र ॥ राज्यांत नाहीं अणुमात्र ॥
सीतेसहित राजीवनेत्र ॥ ब्रह्मांनंदें वर्ततसे ॥९४॥
वसिष्ठ विश्वामित्र अगस्ति ॥ आणिक ऋषि जैसे गभस्ति ॥
अयोध्येमाजी सदा वसती ॥ जनकजापतीचे समीप ॥९५॥
अगस्तीच्या मुखें श्रवण ॥ नित्य करी रघुनंदन ॥
सदा तृप्त याचकजन ॥ राघवदर्शन घेतांचि ॥९६॥
सुरस रामविजय ग्रंथ ॥ उत्तराकांड कथा अद्‌भुत ॥
राज्यीं बैसला राजीवनेत्र ॥ धन्य कार्यार्थ सुरस हा ॥९७॥
रामविजयाचें एक आवर्तन ॥ करी संपूर्ण पापाचें दहन ॥
आणि शत्रुपराजय पूर्ण ॥ श्रवण करितां होतसे ॥९८॥
अज्ञानांसी होय ज्ञान ॥ निपुत्रिकांसी पुत्रसंतान ॥
भवरोग जाय विरून ॥ भावेंकरून परिसतां ॥९९॥
अयोध्याप्रवेश जाहला पूर्ण ॥ पुढें रसाळ कथा गहन ॥
श्रवण करोत पंडितजन ॥ राघवीं मन समर्पूनियां ॥२००॥
अयोध्यापुरवासिया रामा ॥ श्रीब्रह्मानंदा कल्याणधामा ॥
श्रीधरवरदा पूर्णकामा ॥ नामा अनामा अतीत तूं ॥१॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ षट्‌त्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२०२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय सदतिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जयजय राघवा करुणाकरा ॥ अवनिजाकुलभूषणा मनविहारा ॥
रावणानुजपाळका समरधीरा ॥ मित्रपुत्रहितप्रिया ॥१॥
प्रतापसूर्यवंशिविवर्धना ॥ मयजामातकुलकाननच्छेदना ॥
सकळवृंदारकबंधमोचना ॥ आनंदसदना अक्षया ॥२॥
कौसल्याहृदयारविंदभ्रमरा ॥ भरतनयनपद्मदिवाकरा ॥
सौमित्रप्राणआधारा ॥ अतिउदारा अयोध्याप्रभो ॥३॥
ब्रह्मानंदा रघुनंदना ॥ वदवीं पुढें ग्रंथरचना ॥
तुझी लीला जगन्मोहना ॥ तूंचि बोलें यथार्थ ॥४॥
पंडितीं ऐकावें सावधान ॥ छत्तिसावे अध्यायीं जाण ॥
राजाधिराज रघुनंदन ॥ राज्यासनीं बैसला ॥५॥
एकादशसहस्र वर्षें ॥ निर्विघ्न राज्य पुराणपुरुषें ॥
अयोध्येचें केलें संतोषें ॥ विश्व सकळ कोंदलें ॥६॥
तों विदेहराजनंदिनी ॥ जगन्माता प्रणवरूपिणी ॥
ते अयोध्यापतीची राणी ॥ झाली गर्भिणी पहिल्यानेंं ॥७॥
शास्त्रसंख्या मास भरतां जाण ॥ वोंटभरण करी रघुनंदन ॥
तो सोहळा वर्णितां पूर्ण ॥ भागे वदन शेषाचें ॥८॥
वसंतकाळीं क्रीडावनांत ॥ राघव प्रवेशला सीतेसहित ॥
अत्यंत वन तें शोभिवंत ॥ नंदनवनाहूनियां ॥९॥
वृक्ष सदाफळ आणि सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥
तेथें सीतेची अंगुली धरून ॥ राजीवनयन विचरतसे ॥१०॥
नानावृक्षांचिया जाती ॥ सीतेस दावी त्रिभुवनपती ॥
एकांत देखोन सीतेप्रति ॥ पुसत राघव प्रीतीनें ॥११॥
म्हणे सुकुमारे जनकबाळे ॥ तुज काय होताती अंतरीं डोहळे ॥
मना आवडे ते यें वेळे ॥ सांग सर्वही पुरवीन ॥१२॥
मग इच्छित हास्यवदन ॥ जानकी देत प्रतिवचन ॥
म्हणे एक आवडे रघुनंदन ॥ नलगे आन पदार्थ ॥१३॥
राजीवाक्ष म्हणे लाज सोडोनी ॥ डोहळे सांग काय ते मनीं ॥
जें म्हणशील ते यें क्षणी ॥ पुरवीन जाण राजसे ॥१४॥
जनकजा बोले याउपरी ॥ म्हणे जन्हकुमारीचिये तीरीं ॥
पवित्र ऋषिपत्‍न्यांमाझारीं ॥ पंचरात्रीं राहावें ॥१५॥
घालोनियां तृणासन ॥ करावें भूमीवरी शयन ॥
कंदमुळें भक्षून ॥ शुचिर्भूत असावे ॥१६॥
मनांत म्हणे रघुनंदन ॥ पूर्वी वनवास भोगिले दारुण ॥
अजूनि न धायेचि मन ॥ आवडे कानन इयेते ॥१७॥
पुढील भविष्यार्थ जाणोन ॥ अवश्य म्हणे रघुनंदन ॥
मनकामना पूर्ण करीन ॥ तुझी जाण सुकुमारें ॥१८॥
याउपरी एकदां रघुवीर ॥ पुरींचे रक्षक जे हेर ॥
त्यांसी पुसतसे श्रीधर ॥ दृढभावे निर्धारें ॥१९॥
तुम्ही नगरीं हिंडतां निरंतर ॥ आकर्णितां जनवार्ता समग्र ॥
तरी तें सांगावें साचार ॥ लोक काय म्हणती आम्हां ॥२०॥
वंदिती किंवा निंदिती ॥ यश किंवा अपयश स्थापिती ॥
अभय असे तुम्हांप्रती ॥ सांगा निश्चिती काय तें ॥२१॥
हेर म्हणती नगरांत ॥ राघवा तुझे सर्व भक्त ॥
सकळ लोक पुण्यवंत ॥ यश वर्णिती सर्वदा ॥२२॥
पर रजक एक दुर्जन ॥ तेणें स्त्रीस केलें ताडन ॥
त्या रागें ती स्त्री रुसोन ॥ पितृसदनाप्रति गेली ॥२३॥
माहेरी होती बहुदिन ॥ मग पित्यानें हातीं धरून ॥
जामातगृहाप्रति नेऊन ॥ घालिता जाहला ते काळीं ॥२४॥
तंव तो रजक क्रोधायमान ॥ श्वशुराप्रति बोले वचन ॥
म्हणे ईस माझें सदन ॥ प्रवेशों नेदीं सर्वथा ॥२५॥
मी तों राम नव्हे निर्धारी ॥ रावणें नेली त्याची अंतुरीं ॥
षण्मास होती असुरघरीं ॥ तेणें माघारी आणिली ॥२६॥
आम्ही रजक शुद्ध साचार ॥ जगाचे डाग काढणार ॥
आमुचे जातींत निर्धार ॥ विपरीत ऐसें सोसेना ॥२७॥
हे अनुचित केले रघुनाथें ॥ मागुती नांदवितो सीतेतें ॥
तैसा लंपट मी नव्हे येथें ॥ वदन इचें न पाहेंचि ॥२८॥
ऐसा चांडाळ तो रजक ॥ बोलिला लावून कलंक ॥
ऐसें ऐकतां रघुनाथ ॥ परम संतप्त जाहला ॥२९॥
पाचारूनिया लक्ष्मण ॥ त्यास सांगे सकळ वर्तमान ॥
म्हणे रजक निंदिलें मजलागून ॥ जानकी त्यागीन सौमित्रा ॥३०॥
दशमुख मारूनि सहकुळीं ॥ सुवेळीं आणिली जनकबाळी ॥
विधि पुरंदर चंद्रमौळी ॥ देवमंडळी सर्व होती ॥३१॥
सकळां देखत ते वेळें ॥ जानकीनें दिव्य दाविलें ॥
अजूनि रजक लांछन बोले ॥ तें मज सोसवे निर्धारे ॥३२॥
तनु त्यागी जैसे प्राण ॥ कोप टाकी रेणुकारमण ॥
कीं संसारसंकल्प तपोधन ॥ त्यागी जैसा साक्षेपें ॥३३॥
संसारभय तत्वतां ॥ योगी टाकी जैसी ममता ॥
तैसीच त्यागीन मी सीता ॥ सुमित्रासुता सत्य हें ॥३४॥
अहिंसक हिंसा सांडिती पूर्ण ॥ कीं मौनी त्यागी वाचाळपण ॥
सत्पुरुष मनांतून ॥ परनिंदा त्यागी जैसा ॥३५॥
श्रोत्रिय त्यागी दुष्टाचार ॥ तैसी सीता त्यागीन साचार ॥
यावरी सुमित्राकुमार ॥ काय बोलता जाहला ॥३६॥
पाखांडी म्लेंच्छ दुर्मती ॥ सदा निंदती वेदश्रुती ॥
परी पंडित काय त्यागिती ॥ जनकजापती सांगे हें ॥३७॥
मुक्तांस निंदिती वायस ॥ परी टाकिती काय राजहंस ॥
दर्दुर निंदती भ्रमरास ॥ परी तो पद्मिमीस टाकीना ॥३८॥
निंदक निंदिती संतांस ॥ परी विवेकीं पूजी रात्रंदिवस ॥
तस्कर निंदिती इंदूस ॥ परी चकोर विटेना ॥३९॥
याकारणें जनकजामाता ॥ सहसा न त्यागीं गुणसरिता ॥
त्या रजकाची सत्वतां ॥ जिव्हां आतां छेदीन ॥४०॥
श्रीराम म्हणे विशेष ॥ तरी लोक निंदितील रात्रंदिवस ॥
म्हणती दंडिले रजकास ॥ अंगीं दोष म्हणोनियां ॥४१॥
आतां सौमित्रा हेंचि जाण ॥ सीता टाकीं वनीं नेऊन ॥
नाहीं तरी आपुला प्राण ॥ मी त्यागीन आतांचि ॥४२॥
ऐसें बोलतां निर्वाण ॥ तत्काळ उठिला लक्ष्मण ॥
ब्राह्मी मुहूर्ती तेव्हां सदन ॥ जानकीचें प्रवेशला ॥४३॥
परम विव्हळ होऊन ॥ जगन्मातेचे वंदिले चरण ॥
म्हणे पहावया तापसारण्य ॥ आज्ञा दीधली रघूत्तमें ॥४४॥
ऐसें ऐकतांचि श्रवणी ॥ मनी हर्षली विदेहनंदिनी ॥
म्हणे जे डोहाळे पुरवीन चापपाणी ॥ मागे वचन बोलिले ॥४५॥
साच करावया तया वचना ॥ तुम्हांसी पाठविलें लक्ष्मणा ॥
तरी पंचरात्री क्रमोन जाणा ॥ सत्वर येऊं माघारें ॥४६॥
ऐसें सौमित्रें ऐकतां कर्णीं ॥ अश्रु सांडी नयनींहूनि ॥
मनीं म्हणे आता परतोनि ॥ कैंचे येणें माउलीये ॥४७॥
असो जानकी हर्षयुक्त ॥ वस्त्राभरणें वस्तु बहुत ॥
सौभाग्येद्रव्यें सवें घेत ॥ ऋषीअंगना पूजावया ॥४८॥
मंगळभगिनी सौभाग्यसरिता ॥ रथी बैसली क्षण न लागतां ॥
लक्ष्मणें रथ झांकून तत्वतां ॥ धुरेस आपण बैसला ॥४९॥
कोणास वार्ता न कळत ॥ जान्हवीतीरा आणिला रथ ॥
तेव्हां अपशकुन बहुत ॥ जगन्मातेस जाणवती ॥५०॥
आडवे महाउरग धांवती ॥ पतिवियोग पिंगळे वदती ॥
वायस वामभागें जाती ॥ शोक सांगती अत्यंत ॥५१॥
ऐसें अपशकून देखतां ॥ मनी दचके जनकदुहिता ॥
देवराप्रति पुसे तत्वतां ॥ चिन्हें विपरीत कां दिसती ॥५२॥
तंव तो भूधरावतार ॥ सहसा नेदी प्रत्युत्तर ॥
नयनीं वहातसे नीर ॥ कंठ सद्दित जाहला ॥५३॥
सीता म्हणे बंधुसहित ॥ सुखरूप असो जनकजामात ॥
त्याचें अशुभ दुःख समस्त ॥ ते मजवरी पडो कां ॥५४॥
मग म्हणे देवरा सुमती ॥ विलोकून वन आणी भागीरथी ॥
सत्वर जाऊं अयोध्याप्रती ॥ रघुपतीस पहावया ॥५५॥
परी तो न बोलेचि सर्वथा ॥ तटस्थ पाहे रघुवीरकांता ॥
पुढें नौकेमाजी जनकदुहिता ॥ रथासहित बैसविली ॥५६॥
सुरनदी उतरूनि ते वेळीं ॥ सत्वरपैल पार नेली ॥
मागुती रथ भूमंडळी ॥ पवनवेगें चालविला ॥५७॥
परम भयंकर कानन ॥ नाहीं मनुष्याचें दर्शन ॥
सिंह सर्प व्याघ्र पूर्ण ॥ वास्तव्य करिती त्या स्थळीं ॥५८॥
सीता म्हणे वो ऊर्मिलापती ॥ कां येथें ऋषिआश्रम न दिसती ॥
कोणीकडे राहिली भागीरथी ॥ नेतां निश्चिंतीं मज कोठें ॥५९॥
विप्रवेदघोष कानीं ॥ कां ऐकूं न येती अजूनी ॥
स्वाहास्वधावषट्कारध्वनीं ॥ यागसदनीं कां न उठतीं ॥६०॥
तों गहनवनीं नेऊनि रथ ॥ सौमित्र तृणशेज करित ॥
जानकीस उतरूनि त्वरित ॥ बैसविली तये ठायीं ॥६१॥
तों भूगर्भीचें दिव्य रत्‍न ॥ वनिताचक्रांत मुख्य मंडण ॥
की लावण्यभूमीचें निधान ॥ वनीं लक्ष्मण टाकित ॥६२॥
तें सौंदर्यनभींचे नक्षत्र ॥ कीं त्रिभुवनींचे कृपापात्र ॥
अंगींच्या तेजे अपार ॥ वन तेव्हां उजळले ॥६३॥
चंद्री वसे सदा कलंक ॥ त्याहूनि सुंदर जानकीचे मुख ॥
चपळेहूनि अधिक ॥ अलंकार शोभती ॥६४॥
असो तृणशेजेसी सीता बैसवून ॥ सौमित्र करी साष्टांग नमन ॥
खालतें करूनियां वदन ॥ स्फुंदत उभा ठाकला ॥६५॥
प्रदिक्षणा करून लक्ष्मण ॥ पुढती दृढ धरी चरण ॥
देवराचें शुभ वचन ॥ तटस्थ ऐके जानकी ॥६६॥
सौमित्र म्हणे जगन्माते ॥ तुज वनीं सोडिलें रघुनाथें ॥
त्याची आज्ञा अलोट मातें ॥ घेऊनि आलों म्हणोनी ॥६७॥
रजकें निंदा केली म्हणोनी ॥ तुज सोडविलें घोर वनी ॥
आतां रघुपतीचे चरण मनीं ॥ आठवीत राहें सुखेंचि ॥६८॥
कमळिणी सुकुमार बहुत ॥ तयेवरी वीज पडे अकस्मात ॥
मग पद्मिणीचा होय अंत ॥ तेवीं मूर्च्छित पडे सीता ॥६९॥
रुदन करी भूधरावतार ॥ रथारूढ झाला सत्वर ॥
तेथोनि परतला ऊर्मिलावर ॥ कठिण मन करूनियां ॥७०॥
वनदेवतां वृक्ष पाषाण ॥ वारण उरग पंचानन ॥
तयांसी विनवी लक्ष्मण ॥ जानकी जतन करा हे ॥७१॥
पृथ्वी आप तेज समीर ॥ अवघियांनो जनत करा सुकुमार ॥
असो पवनवेगें सौमित्र ॥ अयोध्यापुरा पातला ॥७२॥
इकडे सीता मूर्च्छना सांवरून ॥ उघडोन पाहे पद्मनयन ॥
तों दूरी गेला लक्ष्मण ॥ उभी ठाकून हांक फोडी ॥७३॥
बाह्या उभारून तत्वतां ॥ म्हणे परत वेगें सुमित्रासुता ॥
माझा अन्याय कांही नसतां ॥ कां हो जातां टाकूनि मज ॥७४॥
सत्वर माझा वध तरी करोनी ॥ सांगा रघुपतीस जाऊनी ॥
मी एकली दुस्तर वनीं ॥ कवण्या ठाया जाऊं आतां ॥७५॥
म्हणे धांव धांव रघुनाथा ॥ म्हणोनि हांक देत जगन्माता ॥
वनीं श्वापदें वृक्ष लता ॥ तयांस गहिंवर दाटला ॥७६॥
थरथरां कांपत मेदिनी ॥ पर्वत पक्षी रडती वनीं ॥
गज व्याघ्र मूर्च्छना येऊनी ॥ दुःखेकरून पडताती ॥७७॥
हंस मुक्तहार सांडोनी ॥ सीता देखतां रडती वनीं ॥
नृत्यकला विसरोनी ॥ शिखी शोक करिताती ॥७८॥
पक्षी स्वपदें ते वेळीं ॥ सीतेवरी करिती साउली ॥
जळें चंचू भरूनि सकळी ॥ जनकजेवरी शिंपिती ॥७९॥
वनगाई पुच्छेकरून ॥ सीतेवरी घालिती पवन ॥
वनदेवता करिती रुदन ॥ सीतादेवी देखोनियां ॥८०॥
वनचरकळप कांतारीं ॥ रुदन करित दीर्घस्वरीं ॥
वैरभाव ते अवसरीं ॥ विसरती मोहशोकें ॥८१॥
हे राम हे राम म्हणोन ॥ सीता विलापें अतिगहन ॥
गुल्मलता वापी कूप जाण ॥ सरिता शोकें कांपिन्नल्या ॥८२॥
हे रामा राजीवनेत्रा ॥ मज कां त्यागिलें पवित्रा ॥
तूं दीनदयाळा पवित्रा ॥ विसरलासी ये काळीं ॥८३॥
कांहो मोकलिले एकलीतें ॥ आतां सांभाळील कोण मातें ॥
कोठें थ्ज्ञारा न दिसेचि येथ ॥ तुजविण मज राघवा ॥८४॥
काय अन्याय जाहला मजपासूनी ॥ मज टाकिलें घोरवनीं ॥
कृपासागरा चापपाणी ॥ श्रुत मज त्वां न केले ॥८५॥
जन्मोनि नेणें दोषांते ॥ स्वप्नी नातळे दुर्बुद्धीते ॥
परी जन्मांतर न कळे मातें ॥ तें कां ठाकोनि आलें भोगावया ॥८६॥
तूं अनाथबंधु करुणाकर ॥ मी दासी हीन पामर ॥
माझा न कीजे अव्हेर ॥ सकळ गण -गोत तूं माझे ॥८७॥
अगा हे श्रीदशरथी ॥ माझी करुणा नुपजे चित्तीं ॥
कैसा स्नेह सांडोनि रघुपती ॥ निष्ठुर जाहलासी मजवरी ॥८८॥
मी अज्ञान बाळ भोळें ॥ सहज पुसिलें कृपा कल्होळें ॥
त्याचें फळ कीं त्यागिले ॥ महावनी एकटें ॥८९॥
आतां जाऊं कोणीकडे ॥ कवण जिवलग येथें सांपडे ॥
जें माझें जन्मसांकडे ॥ निवारील दर्शनी ॥९०॥
रामा तूंचि बापमाय ॥ बंधु सुहृद गोत होय ॥
मम अपराध विसरून जाय ॥ अभय देईं मज आतां ॥९१॥
करुणासागरा रघुवीरा ॥ मातें उद्धरी दयासमुद्रा ॥
तुझें ध्यान असंख्यमुद्रा ॥ चित्तीं वसो माझिया ॥९२॥
तंव अयोध्यापुराा लक्ष्मण ॥ पावला तेव्हां म्लानवदन ॥
तो गुणसिंधु रघुनंदन ॥ एकांतसदनीं बैसला असे ॥९३॥
तेथें ऊर्मिलावरें जाऊनी ॥ भाळ ठेविलें रामचरणीं ॥
करुणार्णवे सीता आठवूनी ॥ अश्रु नयनीं आणिले ॥९४॥
सौमित्र म्हणे रघुराया ॥ चित्रींच्या वृक्षाची छाया ॥
स्वप्नवत् संसारमाया ॥ लटकी जैसी मुळींहूनी ॥९५॥
नावरे अत्यंत शोकसागर ॥ परी कलशोद्‌भव जाहला रघुवीर ॥
आचमन करूनि समग्र ॥ उगाचि मौने बैसला ॥९६॥
असो इकडे जनकनंदिनी ॥ निघाली चालत दुःखें वनीं ॥
मूर्च्छना येऊनि क्षणक्षणीं ॥ जमिनीवरी पडतसे ॥९७॥
मागुती उठे हस्त टेंकूनी ॥ रुदन करी धाय मोकलूनी ॥
म्हणे कोण्या ठायां जाऊनी ॥ राहूं आता राघवेंद्रा ॥९८॥
मी अनाथ अत्यंत दीन ॥ जरी देऊं येथे प्राण ॥
तरी आत्महत्त्या पाप गहन ॥ दुजी गर्भहत्त्या घडेल ॥९९॥
कळपांतून धेनू चुकली ॥ कीं हरिणी एकटी वनी पडली ॥
जीवनेंविण मासोळी ॥ तळमळीत जैसी कां ॥१००॥
कीं नैषधरायाची राणी ॥ पूर्वीं पडिली घोरवनीं ॥
कीं भिल्लीवेषें भवानी ॥ एकटी काननी जेवीं हिंडे ॥१॥
एक मार्ग न दिसे तेथ ॥ सव्य अपसव्य वनीं हिंडत ॥
दीर्घस्वरें रुदन करित ॥ तों नवल एक वर्तले ॥२॥
तेथें कंदमुळें न्यावयासी ॥ वना आले वाल्मीक ऋषी ॥
तो त्रिकाळज्ञानी तेजोराशी ॥ ज्याचे ज्ञानासी सीमा नाहीं ॥३॥
अवतारादि जन्मपत्र ॥ जेणें रामकथा केली विचित्र ॥
तेणें जगन्मातेचा शोकस्वर ॥ कर्णीं ऐकिला हिंडता ॥४॥
सीता देखिली दुरोनी ॥ जवळी येत वाल्मिक मुनी ॥
म्हणे आमची तपःश्रेणी ॥ प्रकट जाहली येणें रूपें ॥५॥
म्हणे कोण हे शुभकल्याणी ॥ कीं मूळ प्रकृती प्रणवरूपिणी ॥
कीं अनादिपीठनिवासिनी ॥ दर्शन द्यावया प्रकटली हे ॥६॥
मग म्हणे जवळी येऊन ॥ सांग माते आहेस तू कोण ॥
कां सेविलें घोरवन ॥ कोणें दुःख दिधले ॥७॥
मग बोले जगन्माता ॥ मी मिथिलेश्वराची दुहिता ॥
रावणांतकाची असें कांता ॥ सौमित्रें आणोनि सोडिलें वनी ॥८॥
अन्याय नसतां किंचित ॥ टाकिलें घोर अरण्यांत ॥
परदेशी आहे मी अनाथ ॥ तरी माझा तात केवळ तूं ॥९॥
मग ऋषी म्हणे वो जननी ॥ माझें नाम वाल्मिक मुनी ॥
अयोध्यानाथ कोदंडपाणी ॥ मज बरवें जाणतसे ॥११०॥
त्याचें भाष्य मी करी निरंतर ॥ मज जाणतसे मिथिलेश्वर ॥
तुझा पिता आमुचा मित्र ॥ कन्या साचार तूं माझी ॥११॥
तुज होतील दोन पुत्र ॥ पित्याहून पराक्रमी थोर ॥
तुज घातलें जेणें बाहेर ॥ त्याचा सूड घेतील ते ॥१२॥
मग जानकीस हातीं धरून ॥ गेला आश्रमा घेऊन ॥
भोंवते मिळाले ऋषिजन ॥ काय वचन बोलिले ॥१३॥
म्हणती हे कोण आहे ताता ॥ येरु म्हणती जानकी जगन्माता ॥
ऋषि म्हणती अनर्थ तत्वतां ॥ घरासी आणिला साक्षेपें ॥१४॥
आम्ही अत्यंत भोळे ब्राह्मण ॥ टाकोनि ग्राम कुटिल जन ॥
वसविलें घोर कानन ॥ येथेंही विघ्न आणिलें ॥१५॥
इचें सुंदरपण अत्यंत ॥ इजवरी अपवाद बहुत ॥
इचे पायीं आम्हांसी घात ॥ होऊं शके एखादा ॥१६॥
एक म्हणती सीता सती ॥ जरी हे असेल निश्चिती ॥
तरी येथें वळोनि भागीरथी ॥ अकस्मात आणील ॥१७॥
हे जरी नव्हे इचेनी ॥ तरी दवडावी येच क्षणीं ॥
ऐसें ऐकतां जनकनंदिनी ॥ भागीरथीस पाचारीत ॥१८॥
म्हणे सगरकुलतारक माये ॥ हरिचरणोद्‌भव जन्हुतनये ॥
ब्रह्मकटाह फोडून स्वयें ॥ प्रकट होसी अद्‌भुत ॥१९॥
कमलोद्‌भव कमलावर ॥ शिव इंद्रादि सकळ निर्जर ॥
सप्तऋषि मुख्य सनत्कुमार ॥ निरंतर तुज स्तविती ॥१२०॥
तुझें अणुमात्र स्पर्शतां नीर ॥ भस्म होती पापें अपार ॥
शुभ्र समुनांचा दिव्य हार ॥ हा मुकुटीं शुभ्र तेवीं दिसे ॥२१॥
हिमनग भेदोनि साचार ॥ एकसरें भरला सागर ॥
तरी मजकारणें वेगवक्र ॥ जननी धांव या पंथे ॥२२॥
ऋषी सकळ झाले भयभीत ॥ ऐसा ओघ लोटला अद्‌भुत ॥
आश्रम सांडोनि ऋषी पळत ॥ चित्त उद्विग्न सर्वांचे ॥२३॥
एक सीतेस करी नमन ॥ माते आश्रम जाती बुडोन ॥
आम्हांसी रक्षावया तुजविण ॥ कोणी दुजें दिसेना ॥२४॥
मग सीतेनें प्रार्थूनी ते वेळां ॥ ओघ निश्चळ चालविला ॥
सत्य सती जनकबाळा ॥ ऋषी गर्जती सर्वही ॥२५॥
सकळ ऋषी मिळोन ॥ करिती जानकीचें स्तवन ॥
म्हणती माते तुज छळून ॥ जवळी आणिली भागीरथी ॥२६॥
असो वाल्मीकें आपुले आश्रमांत ॥ जानकीतें ठेविलें तेव्हां गुप्त ॥
सकळ ऋषींचे एक मत ॥ अणुमात्र मात फुटेना ॥२७॥
नव मास भरतां पूर्ण ॥ शुभ नक्षत्र शुभ दिन ॥
माध्यान्हीं आला चंडकिरण ॥ तों प्रसूत जाहली जानकी ॥२८॥
वृद्ध ऋषिपत्‍न्या धांवोनि ॥ जवळी आल्या ते क्षणीं ॥
तो दोघे पुत्र देखिले नयनीं ॥ शशी तरणीं ज्यांपरी ॥२९॥
प्रथम उपजे तो धाकुटा केवळ ॥ मागुती उपजे तो वडील ॥
असो दोघे जन्मले बाळ ॥ सांवळे जावळे ते क्षणीं ॥१३०॥
वाल्मीक गेले होते स्नानासी ॥ शिष्य धांवत गेले तयांपासीं ॥
दोघे पुत्र जानकीसी ॥ जाहले म्हणून सांगती ॥३१॥
ऐसें ऐकतांच वचन ॥ येरें कुशलहू हातीं घेऊन ॥
जानकीजवळी येऊन ॥ केलें विधान शास्त्ररीतीं ॥३२॥
कुशेंकरून अभिषेकिला बाळ ॥ त्याचें नाव ठेविला कुश निर्मळ ॥
आकर्णनेत्र घननीळ ॥ प्रतिमा केवळ रामाची ॥३३॥
लवावरी निजवूनी ॥ धाकुटा अभिषेकिला तये क्षणीं ॥
त्यासी नाम लहू ठेउनी ॥ सोहळा केला वाल्मीकें ॥३४॥
शुक्ल पक्षीं वाढे चंद्र ॥ की पळोपळीं वाढे दिनकर ॥
तेवीं दोघे राघवेय सुंदर ॥ वाढूं लागले तैसेचि ॥३५॥
दोघांचे लालन पालन ॥ वाल्मीक करी अनुदिन ॥
ऋषिबाळकांत दोघेजण ॥ क्रीडा करिती निरंतर ॥३६॥
सप्त संवत्सर होतां पूर्ण ॥ वाल्मीकें सुरभी आणोन ॥
आरंभिले मौंजीबंधन ॥ मेळवूनि ऋषी बहुत ॥३७॥
चारी दिवसपर्यंत ॥ जो जो पाहिजे पदार्थ ॥
तो सर्वही कामधेनु पुरवित ॥ जाहले तृप्त अवघे ऋषी ॥३८॥
बाळ सुंदर देखोन ॥ बहु ऋषी देती वरदान ॥
वाल्मीकें वेदाध्ययन ॥ दोघांकडून करविलें ॥३९॥
षट्शास्त्री प्रवीण जाहले ॥ सकळ पुराणें करतलामलें ॥
मग रामचरित्र पढविले ॥ शतकोटी ग्रंथ केला जो ॥१४०॥
बाळांचे ज्ञान अत्यद्‌भत ॥ अधिकाधिक तर्क फुटत ॥
मग मंत्रशास्त्र समस्त ॥ वाल्मीकमुनि सांगे तयां ॥४१॥
मग धनुर्वेद पढवून ॥ हातीं देत धनुष्य बाण ॥
युद्धगति सांगे पूर्ण ॥ दोघेजण धरिती मनीं ॥४२॥
असो चर्तुदश विद्या चौसष्टी कळा ॥ वाल्मीक शिकवी दोघा बाळां ॥
ऋषिपुत्रांचा सवें मेळा ॥ घेऊनि दोघे हिंडती ॥४३॥
नानागोष्टी कौतुकें बोलून ॥ रंजविती जानकीचे मन ॥
कंद मुळें आणून ॥ जगन्मातेपुढें ठेविती ॥४४॥
सत्संग घडता देख ॥ प्राणी विसरे संसारदुःख ॥
तैसें जानकी विसरे सकळिक ॥ खेद मागील त्याचेनी ॥४५॥
दश वर्षें होतां पूर्ण ॥ मृगयेस जाती दोघेजण ॥
नाना श्वापदें मारून ॥ आणिती ओढून दावावया ॥४६॥
एकें दिवशी वनीं हिंडत ॥ तों पर्वतमस्तकीं ध्यानस्थ ॥
एक शृंगी तप करित ॥ वाल्मीकाचा बंधु तो ॥४७॥
तो मृगवेष देखोनि पूर्ण ॥ कुशें विंधिला टाकूनि बाण ॥
तत्काळ गेला त्याचा प्राण ॥ प्रेत ओढून दोघे नेती ॥४८॥
वाल्मीक पुसे जवळी येऊन ॥ काय तें आणितां ओढून ॥
येरू म्हणती मृग वधून ॥ आणिला तुम्हांकारणें ॥४९॥
त्याचें आता चर्म काढून ॥ करूं तुम्हांकारणें आसन ॥
वाल्मीक पाहे विलोकून ॥ तंव तो बंधु वधियेला ॥१५०॥
वाल्मीक म्हणे हे दोघेजण ॥ अनिवार जाहले पूर्ण ॥
बह्महत्त्या करून ॥ कैसे आलां वनांतरी ॥५१॥
बंधूचें उत्तरकार्य सकळिक ॥ विधियुक्त करोनि वाल्मीक ॥
जानकीजवळ तात्काळिक ॥ वर्तमान सांगितलें ॥५२॥
तंव बोले जानकी हांसोन ॥ ताता सूर्यवंश अतितीक्ष्ण ॥
त्यावरी सकळकळाप्रवीण ॥ तुम्हींच केलीं बाळके ॥५३॥
परम धीट अनिवार ॥ तुमचा तुम्हां फळला मंत्र ॥
आतां याच्या दोषास परिहार ॥ करावा जी समर्था ॥५४॥
तों वाल्मीक बोलें वचन ॥ सुवर्णकमळें सहस्र आणून ॥
भावें अर्चावा उमारमण ॥ तरीच जाईल ब्रह्महत्त्या ॥५५॥
तंव ते दोघे तये वेळे ॥ ताता कोठें तीं सुवर्णकमळें ॥
तीं सांगिजे येचि वेळे ॥ घेऊन येतों दोघेही ॥५६॥
मग बोले मुनीश्वर ॥ अयोध्येसमीप ब्रह्मसरोवर ॥
तेथें कमळें अपार ॥ परी रक्षिती वीर रामाचे ॥५७॥
ती ब्रह्मकमळें नेऊन ॥ राघव करितो शिवार्चन ॥
महाबळी रक्षिती पूर्ण ॥ रात्रंदिवस सभोंवते ॥५८॥
गदागदां हांसती दोघेजण ॥ कमळें आणूं न लागता क्षण ॥
तरीच तुमचे शिष्य जाण ॥ निश्चयेसीं मुनिराया ॥५९॥
तेथें कृतांत असेल रक्षण ॥ त्यासीही शिक्षा लावूं पूर्ण ॥
जरी स्वयें आला रघुनंदन ॥ त्यासही धरून आणूं येथें ॥१६०॥
धनुष्यासी लावूनि बाण ॥ चपळ चालिले दोघेजण ॥
जैसें सिंह दिसती लहान ॥ परी प्रताप अतिविशेष ॥६१॥
कीं शशी सूर्य लघु दिसती ॥ परी प्रकाशें उजळे क्षिती ॥
लहान दिसे विप्र अगस्ति ॥ परी सरितापति प्राशिला ॥६२॥
तैसे ते धाकुटे वीर ॥ वेगें पावले ब्रह्मसरोवर ॥
कुश प्रवेशोनि समग्र ॥ कमळें तेव्हां तोडीतसे ॥६३॥
तंव ते वीर खवळले ॥ लहूनें तेव्हां शर सोडिले ॥
रक्षक बहुत प्रेत केले ॥ उरले पळाले अयोध्येसी ॥६४॥
रामासी सांगती वर्तमान ॥ ऋषिबाळ आले दोघेजण ॥
ते सबळ युद्ध करूनि जाण ॥ कमळें घेऊन गेलें पैं ॥६५॥
आश्चर्य करी रघुपती ॥ पाहा केवढी बाळांची शक्ती ॥
असो इकडे दोघे निघती ॥ कमळें घेऊनि त्वरेनें ॥६६॥
वाल्मीकापुढें कमळें ठेविती ॥ ऋषि आश्चर्य करी चित्तीं ॥
तटस्थ पाहे सीता सती ॥ अद्‌भुत कर्तव्य बाळकांचे ॥६७॥
मग नूतन शिवलिंग निर्मून ॥ सहस्रकमळीं केले पूजन ॥
ब्रह्महत्त्येचे पाप पूर्ण ॥ निरसोन गेले तेधवां ॥६८॥
एके दिवशी दोघे जण ॥ चुरीत जो जानकीचे चरण ॥
तंव तो कुश काय वचन ॥ बोलता जाहला ते काळीं ॥६९॥
आम्ही जन्मलों कोणें देशीं ॥ कोण ग्राम कोणे वंशीं ॥
आमुचा पिता निश्चयेसीं ॥ सांगे कोण तो आमुतें ॥१७०॥
सीता म्हणे अयोध्यानगर ॥ सूर्यवंशी अजराजपुत्र ॥
दशरथनामें नृपवर ॥ प्रचंड प्रताप तयाचा ॥७१॥
त्यासी राम लक्ष्मण भरत ॥ चौथा शत्रुघ्न विख्यात ॥
त्यांत रावणांतक प्रतापवंत ॥ तो तुमचा पिता जाणिजे ॥७२॥
रजकें निंदिलें म्हणोनी ॥ बा रे मज सोडिलें घोरवनीं ॥
तेव्हां जगन्मातेचें नयनीं ॥ अश्रु आले बोलतां ॥७३॥
वर्तमान ऐकोनि समस्त ॥ दोघेही परम तप्त ॥
मग सीतेचे समाधान बहुत ॥ करिते जाहले ते काळीं ॥७४॥
तों द्वादशवर्षेपर्यंत ॥ अवर्षण पडिलें अयोध्येंत ॥
सीता सती क्षोभली अद्‌भुत ॥ श्री समस्त गेली पैं ॥७५॥
जैसें उद्वस कां दग्ध कांतार ॥ तैसें कलाहीन अयोध्यानगर ॥
घन न वर्षेच अणुमात्र ॥ गाई विप्र गांजले ॥७६॥
वसिष्ठास पुसे रघुनंदन ॥ कां हो पडिले अवर्षण ॥
येरू म्हणे अपराधाविण ॥ सीता बाहेर घातली ॥७७॥
जानकीऐसें चिद्ररत्‍न ॥ सकळ प्रतिव्रतांचें मंडण ॥
लक्ष्मी गेली निघोन ॥ तरीच अवर्षण पडियेलें ॥७८॥
तरी अश्वमेघ महायज्ञ ॥ राघवा करावा संपूर्ण ॥
घोडा पाहून श्यामकर्ण ॥ पृथ्वीवरी सोडावा ॥७९॥
मग शरयूतीरीं एक योजन ॥ मंडप घातला विस्तीर्ण ॥
दूत पाठवून संपूर्ण ॥ मुनीश्वर मेळविले ॥१८०॥
बिभीषणा आणि सुग्रीवास ॥ बोलावूं पाठवी राघवेश ॥
ते दळासहित अयोध्येस ॥ येते जाहले ते काळीं ॥८१॥
नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ शरभ गवाक्ष बळ अद्‌भुत ॥
वानर पातले समस्त ॥ अष्टादश पद्में पैं ॥८२॥
सर्व सामग्री केली पूर्ण ॥ मग वसिष्ठ रघुनंदन ॥
अश्वशाळेंतूनि श्यामकर्ण ॥ निवडिती पूर्ण सुलक्षणी ॥८३॥
सुवर्णपत्रिका ते वेळी ॥ बांधिली श्यामकर्णाचे भाळीं ॥
वसिष्ठें त्यावरी लिहिल्या ओळी ॥ ऐका सकळ श्रोते हो ॥८४॥
अयोध्याप्रभु दशरथनंदन ॥ रावणांतक सुरबंधमोचन ॥
सकळनृपश्रेष्ठ रविकुळामंडन ॥ श्यामकर्ण सोडिला तेणें ॥८५॥
जो कोणी असेल बळवंत ॥ तेणें हा घोडा धरावा यथार्थ ॥
षोडशपद्में दळांसहित ॥ शत्रुघ्न राखित पाठीसीं ॥८६॥
घोडा पूजोनि राजीवनेत्र ॥ मस्तकीं बांधिलें दिव्य पत्र ॥
शत्रुघ्न करून नमस्कार ॥ दळभारेंसीं निघाला ॥८७॥
शत्रुघ्नासी म्हणे रघुनंदन ॥ सोळावे दिवशीं यावें परतोन ॥
सकळ पृथ्वी जिंकून ॥ नृप सांगातीं आणिजे ॥८८॥
मग सुवर्णप्रतिमा सुंदर ॥ जानकीची निर्मिली परिकर ॥
मग ते प्रतिमेसहित रघुवीर ॥ यज्ञदीक्षा घेत पैं ॥८९॥
जैसा किरणचक्रांत दिवाकर ॥ कीं निर्जरांत अमरेश्वर ॥
तैसा यज्ञमंडपीं रघुवीर ॥ ऋषींसहित शोभला ॥१९०॥
सुग्रीव बिभीषण मारुती ॥ यज्ञमंडपाभोंवते रक्षिती ॥
सुमंत भरत ऊर्मिलापती ॥ सदा तिष्ठत राघवापाशीं ॥९१॥
जे जे साम्रगी लागेल पूर्ण ॥ ते ते तत्काळ देती आणून ॥
तो सोहळा देवगण ॥ विमानी बैसोन पाहाती ॥९२॥
इकडे छप्पन्न देश जिंकित पूर्ण ॥ जात महावीर शत्रुघ्न ॥
सकळ राजे येती शरण ॥ करभार देऊनि सांगातें ॥९३॥
तेच काळीं पाताळी वरुण ॥ आरंभिता जाहला महायज्ञ ॥
तेणें वाल्मीक बोलावून ॥ नेला होता आधींच ॥९४॥
पाताळास गेला जेव्हां ऋषी ॥ तेणें आज्ञा केली लहूसी ॥
बा रे माझिया उपवनासी ॥ रक्षावें तुवां निरंतर ॥९५॥
ऐसें बोलूनि पाताळा ॥ वाल्मीक गेले तये वेळां ॥
कुशही दूर वना प्रवेशला ॥ कंद मुळें आणावया ॥९६॥
लहू उपवन रक्षित ॥ सवें बटु बाळें बहुत ॥
नानाक्रीडा विनोद करित ॥ वृक्षछायेस बैसली ॥९७॥
अष्टवर्षीं दशवर्षीं कुमर ॥ कटी मौंजी कौपीन सुंदर ॥
मस्तकीं शिखा परिकर ॥ खेळतां उडती तयांच्या ॥९८॥
तो श्यामकर्ण धांवत ॥ आता त्याचा पंथें अकस्मात ॥
ऋषिपुत्रास लहू दावित ॥ पाहा रे येथें घोडा कैसा हा ॥९९॥
मग सीतेसुतें धांवून ॥शेंडीसी धरिला श्यामकर्ण ॥
कपाळींचें पत्र तोडून ॥ वाचिता जाहला तात्काळीं ॥२००॥
पत्रार्थ पाहूनि समस्त ॥ लहू गदगदां हांसत ॥
बळिया काय रघुनाथ ॥ त्रिभुवनीं थोर जाहला ॥१॥
काय त्यासीच व्याली जननी ॥ काय निर्वीर जाहली अवनी ॥
तरी कैसा घोडा सोडोनी ॥ नेईल आतां पाहूं पां ॥२॥
माझी प्रतिज्ञा हेच आतां ॥ धरिला घोडा न सोडीं मागुता ॥
नातरी सीतेउदरीं तत्वतां ॥ जंत होऊनि जन्मलों ॥३॥
अश्वोत्तमाचे नेत्र पुसोन ॥ कौतुकेंकरून थापटी मान ॥
उत्तरीय चीर गळां घालून ॥ बांधोन ठेविला केळीसी ॥४॥
ऋषिपुत्रांस तेव्हा म्हणत ॥ पाहा रे घोडा कैसा नाचत ॥
तों ऋषिबाळें समस्त ॥ पोट बडविती भयेंकरूनी ॥५॥
कोण्या राजाचा घोडा आला ॥ तो तुवां बळेंचि धरिला ॥
तरी आम्ही सांगूं तयाला ॥ लहूनें बांधिला म्हणोनी ॥६॥
लहू तयांप्रति बोलत ॥ आमुचीच निश्चयें हे वस्त ॥
आपुली आपण घेतां यत्य ॥ शंका येथें कायसी ॥७॥
काळासी शिक्षा करूनियां ॥ लया पाववीन सर्व क्षत्रियां ॥
तों वीर आले धांवूनियां ॥ अश्वरक्षक पुढील जे ॥८॥
विप्रकुमर देखोन ॥ वीर पुसती दटावून ॥
कोणी रे हा श्यामकर्ण ॥ कर्दळीसीं बांधिला ॥९॥
लेकुरें बोलती भिऊन ॥ पैल किशोर आरक्तनयन ॥
आम्ही वारितांही ठेवीत बांधून ॥ त्याचेच कान कापा हो ॥२१०॥
रामविजय ग्रंथ पावन ॥ त्यामाजी लहूकुशआख्यान ॥
कथा गोड अमृताहून ॥ भक्तचतुरीं परिसावी ॥११॥
ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ जानकीहृदयकमलभ्रमर ॥
अगाध तयाचें चरित्र ॥ सविस्तर संख्या शतकोटी ॥१२॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ सप्तत्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२१३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय अडतिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हातीं घेऊनि चार शर ॥ उभा मंगलभगिनीचा कुमर ॥
तंव मागूनि चतुरंग दळभार ॥ अति गर्जरें पातलें ॥१॥
सवें सकळ पृथ्वीचे नृपवर ॥ मध्यें शत्रुघ्न प्रचंड वीर ॥
तों तेणें ऐकिली मात सुंदर ॥ घोडा धरिला म्हणोनि ॥२॥
भू्रसंकेत दावी शत्रुघ्न ॥ अपार लोटलें तेव्हा सैन्य ॥
तंव कर्दळीस श्यामकर्ण ॥ वस्त्रेंकरून बांधिला असे ॥३॥
ऋषींचीं मुंजियें बाळे खेळती ॥ जे वीर आले ते पुसती ॥
वारू कोणी बांधिला म्हणती ॥ लेकुरें बोलती भिऊनियां ॥४॥
कानावरी हात ठेविती ॥ आम्हीं नाहीं धरिला आण वाहती ॥
पैल दिसे धनुष्य हातीं ॥ कलागती करितो तो ॥५॥
तेणें बांधिला श्यामकर्ण ॥ तंव वीर बोलती हांसोन ॥
म्हणती लेकुरें नेणोन ॥ घोडा बांधिला कौतुकें ॥६॥
सोडा रे सोडा श्यामकर्ण ॥ जवळ उरलें आतां अयोध्यापट्टण ॥
वाट पाहतसे रघुनंदन ॥ सत्वर जावें वेगेंसी ॥७॥
घोडा सोडावया धांवले वीर ॥ तंव तो बोले जानकीकुमर ॥
कोण रे तुम्ही तस्कर ॥ घोडा सोडूं पातलां ॥८॥
घोडा धरिला तोचि मी एथ ॥ उभा लक्षित युद्धपंथ ॥
तुमचा कोण आहे रघुनाथ ॥ त्यासी जाऊन सांगा रे ॥९॥
मज म्हणतां तुम्ही बाळ ॥ परी सर्वांचा मी आहें काळ ॥
तुमचीं गर्वांची कवचें सकळ ॥ फोडीन आज समरांगणीं ॥१०॥
तटस्थ पाहती सकळ वीर ॥ म्हणती हा बाळ सुकुमार ॥
लीलाचाप घेऊनि परिकर ॥ धीट गोष्टी बोलतो ॥११॥
यावरी शस्त्र धरिता निश्चिंती ॥ सकळ योद्धे आम्हां हांसती ॥
तरी वारु सोडून त्वरितगती ॥ पुढें चला सत्वर ॥१२॥
घोडा सोडूं धांवले वीर ॥ लहू चाप ओढी सत्वर ॥
शतांचीं शतें सोडूनि शर ॥ तोडिले कर तितुक्यांचे ॥१३॥
जैसीं वटपत्रें तुटोनि पडती ॥ तैसीं मणगटें पडलीं क्षितीं ॥
तों मागुती बहु वीर धांवती ॥ घे घे शब्देंकरूनियां ॥१४॥
खर्गासहित भुजदंड ॥ लहूनें पाडिले उदंड ॥
जैसे शाखारहित तरू प्रचंड ॥ जैसे वीर उभे तेथे ॥१५॥
जाहला एकचि हाहाकार ॥ सेना लोटली तेव्हां समग्र ॥
लक्षांचे लक्ष वीर ॥ धांवते जाहले ते काळीं ॥१६॥
जैसा धारा वर्षे जलधर ॥ तैसे शर सोडी भूमिजाकुमर ॥
शिरांच्या राशी अपार ॥ पाडिल्या तेव्हां पुरुषार्थे ॥१७॥
दुरोनि पाहती वीर सकळ ॥ बारा वर्षांचा दिसे बाळ ॥
परी प्रचंड वीर समोर काळ ॥ उभा ठाकूं न शकेची ॥१८॥
एक म्हणती गुरु समर्थ ॥ याचा असेल हा यथार्थ ॥
तरीच एवढे सामर्थ्य ॥ कवणासही नाटोपे ॥१९॥
तंव सोळा पद्में दळभार ॥ एकदांचि लोटले समग्र ॥
परी त्या वीरांचे संधान थोर ॥ खिळिले समग्र बाणांनीं ॥२०॥
मयूरपिच्छें पिंजारती ॥ तैसे वीर सकळ दिसती ॥
मग हांक देऊनि महारथी ॥ शत्रुघ्न पुढें लोटला ॥२१॥
गजकलेवरें पडलीं सदट ॥ चालावया नाहीं वाट ॥
वीर पडिले महासुभट ॥ नामांकित पुरुषार्थी ॥२२॥
सकळ प्रेतें मागे टाकून ॥ पुढें धांवला शत्रुघ्न ॥
बाळ पाहिला विलोकून ॥ तंव रघुनंदन दुसरा ॥२३॥
म्हणे कोणाचा तूं किशोर येथ ॥ दळ पाडिलेंस असंख्यात ॥
आतां शिक्षा लावीन तुज बहुत ॥ पाहें पुरुषार्थ पैं माझा ॥२४॥
लहू म्हणे सिंहदरींत वारण ॥ आला मदभरेंकरून ॥
परी तो क्षेम स्वस्ति वांचून ॥ केवीं जाईल माघारा ॥२५॥
विष्णुवहनाचे कवेंतून ॥ उरग केवीं जाय वांचून ॥
ऐसें ऐकतां शत्रुघ्न ॥ लावी बाण चापासी ॥२६॥
आकर्णवरी ओढी ओढून ॥ लहूवरी सोडिला बाण ॥
सीतापुत्रें न लागतां क्षण ॥ तोडोनियां टाकिला ॥२७॥
आणीक सोडिले पांच बाण ॥ तेही तत्काळ टाकिले तोडून ॥
सवेंचि शत शर शत्रुघ्न ॥ मोकलीत अति रागें ॥२८॥
तेही लहू तोडी सत्वर ॥ मग काय करी सीतापुत्र ॥
बाणजाळ घातलें अपार ॥ झांकिलें अंबर प्रतापें ॥२९॥
सेनेसहित कैकयीनंदन ॥ बाणीं नजर जर्जर केला पूर्ण ॥
जें जें शस्त्र प्रेरी शत्रुघ्न ॥ तें तें सवेंच लहू छेदी ॥३०॥
मग निर्वाण बाण जो शत्रुघ्नाते ॥ दिधला होता रघुनाथें ॥
परम संकट देखोनि तेथें ॥ तृणीरांतून ओढिला ॥३१॥
वीज निघे मेघाबाहेर ॥ तैसा झळक तसे दिव्य शर ॥
तो धनुष्यीं योजून सत्वर ॥ लहूवरी सोडिला ॥३२॥
दृष्टीं देखतां सीताकुमर ॥ म्हणे बाण आला दुर्धर ॥
याचें निवारण समग्र ॥ कुश एक जाणतसे ॥३३॥
फळें आणावया कुश गेला ॥ माझा पाठिराखा दुरावला ॥
बाणापुढें यावेळां ॥ न वांचेंचि सर्वथा ॥३४॥
परम धैर्यवंत सीतानंदन ॥ वेगीं सोडिला दिव्यबाण ॥
तेणें शत्रुघ्नाचा निर्वाणबाण ॥ अर्ध खंडिला अंतराळीं ॥३५॥
अर्ध शर जे का उरला ॥ तो लहूचे हृदयीं भेदला ॥
मूर्च्छना येऊनि पडिला ॥ बाळ तेव्हां धरणीवरी ॥३६॥
भडाभडा चालिले रुधिर ॥ आरक्त नेत्र जाहले वक्र ॥
श्वासोच्छास कोंडले समग्र ॥ शेंडी रुधिरें थबथबली ॥३७॥
लहूपासोनि वांचले वीर ॥ त्याणीं सिंहनाद केला थोर ॥
पडिला पडिला किशोर ॥ म्हणोनि समग्र धांवले ॥३८॥
दुरोनि पाहती ते वेळे ॥ एक म्हणती मीस घेतले ॥
मग शत्रुघ्न रथाखालें ॥ उतरूनि जवळी पातला ॥३९॥
शत्रुघ्न जवळी बैसोन ॥ पाहे बाळ विलोकून ॥
धन्य जननी प्रसवली रत्‍न ॥ म्हणोनि उचलूनि घेतला ॥४०॥
श्यामसुंदर आकर्ण नयन ॥ आजानुबाहु सुहास्यवदन ॥
शत्रुघ्नें उदक आणून ॥ मुखींचें अशुद्ध धूतलें ॥४१॥
आश्चर्य करिती अवघे वीर ॥ म्हणती दुजा अवतरला रघुवीर ॥
आतां याची माता अपार ॥ शोक करील यालागीं ॥४२॥
स्नेहाचा पूर अत्यंत ॥ शत्रुघ्नाचे हृदयीं दाटत ॥
नयनीं आले अश्रुपात ॥ बाळक दृष्टीं विलोकितां ॥४३॥
रामचंद्रासी दाखवूं म्हणून ॥ रथी घातला त्वरेंकरून ॥
घेऊनियां श्यामकर्ण ॥ शत्रुघ्न त्वरेनें चालिला ॥४४॥
लागला वाद्यांचा एकचि नाद ॥ मनीं न सामाये आनंद ॥
महासिद्धि साधूनि सिद्ध ॥ घवघवीत परते जैसा ॥४५॥
इकडे लेकुरें धांवोनी ॥ जानकीस सांगती जाउनी ॥
माते तुझा लहू मारूनी ॥ नेला घालोनि रथावरी ॥४६॥
ऐकतां सर्व वर्तमान ॥ जानकी पडिली मूर्च्छा येऊन ॥
जैसें लोभियांचें धन गेलें हारपोन ॥ तैसे प्राण सर्व एकवटती ॥४७॥
जैसी काष्ठाची बाहुली ॥ तैसी निचेष्टित सीता पडली ॥
पुढती आक्रंदत उठिली ॥ वक्षःस्थळ बडवित ॥४८॥
मी अनाथ दुर्बळ ॥ परदेशी भणंग केवळ ॥
माझें धरूनियां बाळ ॥ कोणी निर्दय नेले पैं ॥४९॥
माझी दुर्बळाची दोन बाळें ॥ त्यांत एक धरूनि नेलें ॥
पूर्वकर्म फळास आलें ॥ अहाहा जाहले ओखटें ॥५०॥
बाळ माझे अत्यंत कोमळ ॥ घायें जाहलें असेल विकळ ॥
मुखचंद्र त्याचा अतिनिर्मळ ॥ नयन विशाळ सुरेख ॥५१॥
तेथें लागोनियां बाण ॥ फुटले असतील नयन ॥
सुहास्यवदन छिन्नभिन्न ॥ जाहले असेल बाळाचें ॥५२॥
माझी बाळें अत्यंत दीन ॥ होतीं कंदमुळें भक्षून ॥
तयासीं बळ कैचें संपूर्ण ॥ झुंजावया कोणासीं ॥५३॥
बाळावरी शस्त्र उचलिती ॥ ते क्षत्रिय नव्हेत दुर्मती ॥
कैसी कोणाचेही चित्ती ॥ दया उपजली नाहीं तेथें ॥५४॥
माझें दरिद्रियाचें किंचित धन ॥ कोणें निर्दयें नेलें चोरून ॥
मज अंधाची काठी हिरून ॥ कोणी वनी भिरकाविली ॥५५॥
कोणीं पक्ष माझा छेदिला ॥ कोणी नेत्र माझा फोडिला ॥
माझा कल्पवृक्ष उपडिला ॥ कोण्या पापियें येऊनि ॥५६॥
वाल्मीक तात ये वेळां ॥ तोही गेला असे पाताळा ॥
मजवरी अनर्थ जाहला ॥ कोणा सांगूं जाऊनियां ॥५७॥
कुश वनास गेला तत्वतां ॥ कोण धांवणें करील आतां ॥
माझा लहू बाळ मागुता ॥ कोण मज भेटवील ॥५८॥
तों कुश परतला वनींहून ॥ मार्गीं होती अपशकुन ॥
जड जाहले चालतां चरण ॥ तैसाच धांवून येतसे ॥५९॥
कोपीन मौंजी कटीं शोभत ॥ मस्तकीं शिखा वातें उडत ॥
माता जाहली असेल क्षुधित ॥ म्हणोन धांवत वेगेंसी ॥६०॥
पर्णकुटींत प्रवेशला ॥ म्हणे माते बंधु कोठें गेला ॥
आजि सामोरा मज नाहीं आला ॥ कोठें गुंतला खेळावया ॥६१॥
मग त्रिभुवनपतीची राणी ॥ बोले आक्रोशें हांक फोडूनी ॥
बारे आजि परचक्र ॥ येऊनी ॥ नेला धरून बंधु तुझा ॥६२॥
तूं त्याचा पाठिराखा पूर्ण ॥ तुझें करीत घडीघडी स्मरण ॥
सोडिला असेल तेणें प्राण ॥ तूं लवकरी धांव आतां ॥६३॥
कुशें घेतले धनुष्य बाण ॥ जानकीसी केले साष्टांग नमन ॥
जय सद्‌गुरु वाल्मीक म्हणून ॥ केली गर्जना ते काळीं ॥६४॥
कुरुनाममंत्रें ते वेळी ॥ सर्वांगी विभूति चर्चिली ॥
उभा राहून बाळ बळी ॥ जानकीप्रति बोलत ॥६५॥
अंबे इंद्र चंद्र कुबेर ॥ अथवा ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥
जरी मी असेन तुझा कुमर ॥ तरी बाणेंकरूनि फोडीन ते ॥६६॥
समरांगणीं सर्व वीर ॥ आटोनियां रथ कुंजर ॥
बंधु सोडवीन सत्वर ॥ शिक्षा करीन वैरियां ॥६७॥
आजि दखवीन बळाची प्रौढी ॥ तरीच जन्मलो तुझे पोटी ॥
म्हणून चालिला जगजेठी ॥ नमून माता सत्वर ॥६८॥
कुंजरांचा मार्ग काढीत पूर्ण ॥ जेवीं आवेशें धांवे पंचानन ॥
कीं सर्प शोधावया सुपर्ण ॥ क्रोधें जैसा धांवत ॥६९॥
असो दूर देखोनियां भार ॥ प्रचंड हांक दिधली थोर ॥
उभेरे उभे तस्कर ॥ चोरून नेतां वस्तु माझी ॥७०॥
तस्करासी शिक्षा हेचि पूर्ण ॥ हस्तचरण खंडोन ॥
कर्ण नासिका छेदोन ॥ शिक्षा लावीन येथेंचि ॥७१॥
खळबळला सेनासमुद्र ॥ अवघे माघारें पाहती वीर ॥
तों राजस घनश्याम सुंदर ॥ दिसे राघव दुसरा ॥७२॥
द्वादश वर्षांचा किशोर ॥ देखोनि चळचळां कांपती वीर ॥
एक म्हणती सकळ संहार ॥ करील आतां उरलियांचा ॥७३॥
तों कुशें कोदंड चढवून ॥ सोडिले तेव्हां दिव्य बाण ॥
किंवा वर्षत पर्जन्य ॥ सायकांचा ते काळीं ॥७४॥
तों सेनापति दळ घेऊन ॥ मुरडला तेव्हां वर्षंत बाण ॥
म्हणे बाळा तुज न लागतां क्षण ॥ धरून नेईन अयोध्ये ॥७५॥
मग निर्वाणीचें दहा बाण ॥ कुशावरी प्रेरिले दारुण ॥
येरें एकचि शर सोडून ॥ दहाही छेदिले ते काळीं ॥७६॥
जैसे मूढाचे बोल अपार ॥ एकेंचि शब्दें चतुर ॥
कीं स्पर्शतां जान्हवीचें नीर ॥ पापें सर्वत्र संहारती ॥७७॥
तैसे कुशें शर छेदून ॥ तत्काळ सोडिले नव बाण ॥
चारी वारू आणि स्यंदन ॥ सेनापतीचा तोडिला ॥७८॥
आणिक तीन बाण सोडिले ॥ चाप हातींचे छेदिले ॥
कवच आंगींचे उडविले ॥ विरथ केलें ते काळीं ॥७९॥
पुढें चरणचाली चालत ॥ कुशावरी आला अकस्मात ॥
जैसा कां सुकर उन्मत्त ॥ मृगेंद्रावरी चौताळे ॥८०॥
तों कुशें सोडूनि दोन बाण ॥ दोनी हस्त टाकिले छेदून ॥
सवेंच दिव्य शर सोडून ॥ शिर तयाचें उडविलें ॥८१॥
सेनापति पडतांच ते वेळां ॥ एकचि हाहाकार जाहला ॥
तों तयाचा बंधु सरसावला ॥ नागेंद्र नाम जयासी ॥८२॥
विद्युत्प्राय वीस बाण ॥ नागेंद्रं सोडिले चापीं योजून ॥
त्या शरतेजें प्रकाशलें गगन ॥ मग सीतानंदन काय करी ॥८३॥
एकेंचि शरें ते वेळे ॥ वीसही बाण पिष्ट केले ॥
जैसीं एकाचि नामें सकळें ॥ महापातकें भस्म होती ॥८४॥
मग सोडोनि अर्धचंद्र शर ॥ उडविले नागेंद्राचे शिर ॥
सोडित बहु बाणांचा पूर ॥ न ये समोर कोणीही ॥८५॥
तों समीरासी मागें टाकून ॥ पुढें धांवला कैकयीनंदन ॥
चपळेहून सतेज बाण ॥ वर्षता जाहला ते काळीं ॥८६॥
तंव तो राघवी वीर चतुर ॥ एवं पिष्टवत् करी शर ॥
सवेंचि बाण अपार ॥ वर्षत मेघासारिखा ॥८७॥
उरलें शत्रुघ्नाचें दळ ॥ शिरें छेदोनि पाडी सकळ ॥
जैसें अपार जलदजाळ ॥ प्रभंजन विभाडी ॥८८॥
मग आठवोनि वाल्मीकाचे चरण ॥ काढिला सद्रुरुदत्त बाण ॥
सोडिला जेवीं पंचानन ॥ वारणावरी चपेटे ॥८९॥
वज्र पडे शैलशिखरी ॥ तैसा शत्रुघ्नाचे हृदयावरी ॥
बाण खडतरला ते अवसरीं ॥ पडला धरणीं शत्रुघ्न ॥९०॥
मग भोंवतें पाहे कुश वीर ॥ तंव एकही नये समोर ॥
जैसा दिनकराप्रति अंधकार ॥ मुख परतोनि न दाखवी ॥९१॥
षोडश पद्में दळभार ॥ आणीक देशोदेशींचे नृपवर ॥
तितुकेही संहारिले समग्र ॥ जैसें तृण अग्निसंगें ॥९२॥
मग कुश चापासी घाली गवसणी ॥ जैसा याज्ञिक आच्छादी अग्नी ॥
कीं मेघांमाजी सौदामिनी ॥ गुप्त जैसी राहिली ॥९३॥
जैसीं उद्वसग्रामींचीं मंदिरें ॥ तेवीं रथ शून्य दिसती एकसरें ॥
लहूवाकारणें कुशेंद्रें ॥ तितुकेंही शोधिले ते काळी ॥९४॥
व्हावया वस्तुसाक्षात्कार ॥ साधक शोधिती तत्वें समग्र ॥
तैसे रथ शोधित कुशेंद्र ॥ बंधुरत्‍नाकारणें ॥९५॥
तों शत्रुघ्नाचा मुख्य रथ ॥ त्यावरी लहु होता मूर्च्छागत ॥
तों कुशें उचलूनियां त्वरित ॥ हृदयकमळीं आलिंगिला ॥९६॥
तों लहूनें उघडिले नयन ॥ विलोकी निजबंधूचें वदन ॥
तत्काळ उभा ठाकला उठोन ॥ म्हणे शत्रुघ्न पळून गेला कोठें ॥९७॥
देह चारी शोधोनि विविध ॥ संत अंतरीं धरिती बोध ॥
तैसाच कुश होऊनि सद्रद ॥ बंधूस हृदयीं धरियेला ॥९८॥
मग कुश वचन बोलत ॥ बारें तूं श्रमलासी बहुत ॥
येरू म्हणे कष्ट समस्त ॥ हरले तुज देखतां ॥९९॥
म्हणे श्यामकर्ण घेऊन ॥ चला आश्रमा करूं गमन ॥
मग कुश बोलिला वचन ॥ कदा येथून जाऊं नये ॥१००॥
आतां युद्धास येतील बहुत ॥ ते समरीं जिंकून समस्त ॥
मग वारू घेऊनि त्वरित ॥ जाऊं जननीच्या दर्शना ॥१॥
लहू म्हणे घालोनि पैज ॥ घ्यावें अयोध्येचें राज्य ॥
धरून आणावा रघुराज ॥ वाल्मीकचरणाजवळी पैं ॥२॥
असो वृक्षीं बांधोन श्यामकर्ण ॥ हातीं घेऊनि धनुष्य बाण ॥
अयोध्यापंथ लक्षीत पूर्ण ॥ दोघेजण उभे असती ॥३॥
घायाळ सैन्य उरले किंचित ॥ तें अयोध्येसी गेले धांवत ॥
राघवासी सकळ मात ॥ श्रुत केली तेधवां ॥४॥
दळभारासहित पूर्ण ॥ रणीं आटिला वीर शत्रुघ्न ॥
विप्रबाळक दोघेजण ॥ द्वादश वर्षांचे असती पैं ॥५॥
यज्ञमंडपीं रघुनंदन ॥ बंधूचा समाचार ऐकोन ॥
टाकोनि हातींचे अवदान ॥ भूमीवरी उलंडला ॥६॥
नेत्रीं ढळढळां वाहे नीर ॥ गजबजिले भरत सौमित्र ॥
बिभीषण हनुमंत मित्रपुत्र ॥ हडबडिले तेधवां ॥७॥
म्हणती यज्ञासी जाहलें विघ्न ॥ पडला महावीर शत्रुघ्न ॥
असो सौमित्राप्रति राजीवनयन ॥ काय बोलिला तेधवां ॥८॥
म्हणे शत्रुघ्नाऐसा वीरराणा ॥ ऋषिकिशोरें आटिला रणा ॥
तरी सवें घेऊनि अपार सेना ॥ धांवण्या धावे बंधूच्या ॥९॥
श्रीरामचरणाब्ज नमून ॥ वायुवेगें निघाला लक्ष्मण ॥
सवें चतुरंग सैन्य ॥ अपार तेव्हां निघालें ॥११०॥
चवदा गांवें रुंद थोर ॥ मार्गी चालिला सेनासागर ॥
वायुवेगें ऊर्मिलावर ॥ रणमंडळासीं पातला ॥११॥
तो सेनापति काळजीत ॥ सौमित्रासी पावला त्वरित ॥
तंव दोघे देखिले अकस्मात ॥ शशी आदित्य ज्यापरी ॥१२॥
श्यामसुंदर दोघेजण ॥ द्वादश वर्षांच्या मूर्ती लहान ॥
हातीं घेऊनि धनुष्य बाण ॥ धीट दोघे विलोकिती ॥१३॥
पहावया बंधूचें मानस ॥ बोलता जाहला वीर कुश ॥
म्हणे सेना पातली विशेष ॥ प्रताप विशेष दिसतसे ॥१४॥
सेनापति क्रोधयमान ॥ चपळ येतसे त्याचा स्यंदन ॥
आतां हा युद्ध करील दारुण ॥ आम्हांसी पुन्हां नाटोपे ॥१५॥
मग बोलिला लहू वीर ॥ तूं पाठिराखा आलासी सत्वर ॥
आतां मज बळ अपार येथोनियां चढियेले ॥१६॥
जैसी साह्य होतां सरस्वती ॥ सकळ कठिनार्थ उमजती ॥
तेवीं आजि निर्वीर करीन क्षिती ॥ तुझ्या बळेंकरूनियां ॥१७॥
तुजसी युद्धीं राहे समोर ॥ ऐसा असेल कोण वीर ॥
जरी स्वयें आला रामचंद्र ॥ तरी तूं त्यासी नाटोपसी ॥१८॥
तोंवरी गर्जे जलार्णव ॥ जों देखिला नाहीं कलशोद्धव ॥
तूं पंचानन हे सर्व ॥ जंबूक तुजवरी पातले ॥१९॥
जरी तम जिंकील सूर्यासी ॥ कीं भूतें गिळितील काळासी ॥
तरी समरांगणी युद्धासी ॥ तुजसी हें पुरतील ॥१२०॥
जरी आकाश बुडेल मृगजळीं ॥ वारा कोंडिजे भूगोळीं ॥
तरीच तुजसी समदळीं ॥ भिडो शकतील बंधुराया ॥२१॥
परी एकें संशयें गोंविलें ॥ जें माझे धनुष्य भंगिलें ॥
असंख्यात युद्ध जाहले ॥ उपवनाजवळी प्रथमचि ॥२२॥
मग सैन्य दळभार ॥ धरा धरा म्हणती किशोर ॥
आतां जातील हे कोठवर ॥ पाहूं नयनीं आम्हीच कीं ॥२३॥
वीर दोघे उभे ठाकूनी ॥ दळभार विलोकिती नयनीं ॥
सैन्य जैसं तृणप्राय करूनी ॥ उभे ठाकती तैसेच ते ॥२४॥
कुश म्हणे ऐसिया समयासी ॥ कोण चाप देईल आम्हांसी ॥
तरी आतां प्रार्थूं सूर्यासी ॥ धनुष्यप्राप्तीकारणें ॥२५॥
मग ते राघवी वीर दोघेजण ॥ एकनिष्ठें मांडिती सूर्यस्तवन ॥
ऊर्ध्व वदनें करून ॥ सूर्यमंडळ विलोकिती ॥२६॥
जयजय तमनाशका सहस्रकिरणा ॥ अंबरचूडामणे सूर्यनारायणा ॥
जीवमिलिंदबंधमोचना ॥ हृदयदळप्रकाशका ॥२७॥
एकचक्र कनकभूषित रथ ॥ सप्तमुख अश्व वेग बहुत ॥
निमिषार्धामाजी अपार पंथ ॥ क्रमोनि जात मनोगती ॥२८॥
आदिपुरुष तूं निर्विकार ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥
हीं स्वरूपें तुझींच साचार ॥ सर्वप्रकाशका आदित्या ॥२९॥
सकळ रोग दुःख भयहारका ॥ विश्वदीपना विश्वपाळका ॥
त्रिभुवननेत्रप्रकाशका ॥ काळात्मका काळरूपा ॥१३०॥
परिसोनि बाळकांची स्तुती ॥ तत्काळ प्रसन्न जाहला गभस्ती ॥
अक्षय्य धनुष्य क्षितीं ॥ ऊर्ध्वपंथें टाकिले ॥३१॥
सूर्यास साष्टांग नमून ॥ घेतले तेव्हां धनुष्यबाण ॥
म्हणती वाल्मीक गुरु धन्य पूर्ण ॥ सूर्यआराधन दिधलें जेणें ॥३२॥
आम्हांसी सद्‌गुरुराया अखंड ॥ क्षणें जिंकू हे ब्रह्मांड ॥
लहू म्हणे आजि कोड ॥ पुरवीन यांचे संग्रामीं ॥३३॥
सूर्यदत्त कोदंड घेऊन सत्वर ॥ सरसावला तेव्हां लहू वीर ॥
तों सौमित्राचें दळ समग्र ॥ चतुरंग भार लोटला ॥३४॥
अचुक दोघांचे संधान ॥ वायां न जाय टाकिला बाण ॥
पदाती अश्व रथ वारण ॥ तोडोनि पाडिती एकसरें ॥३५॥
कोणी धनुष्याची ओढी ओढित ॥ तों भुज तोडिती अकस्मात ॥
मणगटें असिलतेसहित ॥तोडोनि पाडिती क्षितीवरी ॥३६॥
शिरांच्या लाखोल्या घालोनी ॥ भूलिंगें पूजिली दोघांजणीं ॥
अशुद्धनदी लोटली वनीं ॥ जाती वाहून कलेवरें ॥३७॥
वीर संहारिले अपार ॥ काळजितास म्हणे सौमित्र ॥
हे दोघे असतां एकत्र ॥ कल्पांतीही नाटोपती ॥३८॥
तरी बहुत कटक घेऊन ॥ ज्येष्ठासी धरी तूं वेष्टून ॥
धाकट्याभोंवते आवरण ॥ मी घालूनि धरितसे ॥३९॥
मग दोन भाग कटक केले ॥ दोघे दोहींकडे फोडिले ॥
चोवीस वेढे घातले ॥ सभोंवते सैन्याचे तेधवां ॥१४०॥
सौमित्रें वेढिला लहू वीर ॥ जैसा तृणें झांकिला वैश्वानर ॥
कीं अजांनी कोंडिला महाव्याघ्र ॥ कीं खगेश्वर सर्पांनी ॥४१॥
परी तो लहू प्रतिज्ञावीर ॥ चापासी लावून सोडी शर ॥
फिरत फिरत चक्राकार ॥ सोडी पूर बाणांचा ॥४२॥
धन्य वाल्मीकाचे दिव्य मंत्र ॥ एका बाणाचे कोटी शर ॥
होऊनि शिरें पाडी समग्र ॥ नवल वीर राघवी ॥४३॥
रघुपतीचा मित्र विशेष ॥ रुधीनामा धांवला राक्षस ॥
तो महाबलिष्ठ गगनास ॥ उडोनि गेला तेधवां ॥४४॥
खालीं अकस्मात उतरूनी ॥ लहूचें चाप सत्वर हिरूनी ॥
अंतरिक्ष गेला उडोनी ॥ फळ घेऊन पक्षी जैसा ॥४५॥
हातींचे हिरून नेले चाप ॥ लहू पाहे तटस्थरूप ॥
तस्करापाठीं लागतां सर्प ॥ खंडी जैसा चरणातें ॥४६॥
व्याळ मूषक धरूं जातां ॥ वणव्यांत सांपडे अवचितां ॥
कीं रिसामागें धांवतां ॥ बोरांटी आंगी अडकली ॥४७॥
निधान साधावया गेला ॥ तों विवशीं पडली येऊन गळां ॥
तैसें लहूस जाहलें ते वेळा ॥ धनुष्य नेतां रुधीने ॥४८॥
असो सीतासुत परम चतुर ॥ जैसा निराळी उडे खगेश्वर ॥
तैसा उडोनियां सत्वर ॥ रुधी राक्षस धरियेला ॥४९॥
हातींचे धनुष्य हिरून घेतलें ॥ असुर झोटी धरिला तये वेळे ॥
गरगरां फिरवूनियां बळे ॥ पृथ्वीवरी आपटिला ॥१५०॥
मृत्तिकाघटाचीं शकलें ॥ तेंवि असुरअवयव चूर जाहले ॥
रुधीनें प्राण सोडिले ॥ सकळांदेखतां ते काळीं ॥५१॥
मागुतीं कटकांत उतरोन ॥ युद्ध करी सीतानंदन ॥
चोवीस वेढे संहाररून ॥ टाकिलें सैन्याचे ते क्षणी ॥५२॥
महाझुंजार येऊन ॥ हातींचीं शस्त्रें टाकून ॥
धरिती लहूचे चरण ॥ आमचे प्राण रक्षीं कां ॥५३॥
एक पळती रण सांडून ॥ एक दांतीं धरिती तृण ॥
मग सिंहानादें लक्ष्मण ॥ गर्जोनि पुढें धांविन्नला ॥५४॥
जैसा पांच विजा अतितीक्ष्ण ॥ तैसें सौमित्रें पांच बाण ॥
लहूवरी सोडिले पूर्ण ॥ महाक्रोधंकरूनियां ॥५५॥
रघुवीराचा लहू वीर ॥ तत्काळ सोडी दिव्य शर ॥
पांच बाण केले चूर ॥ लोहपिष्टन्यायेंसी ॥५६॥
लहू सौमित्राप्रति बोलत ॥ त्वां पूर्वी मारिला इंद्रजित ॥
ते तुझी विद्या समस्त ॥ आजि दावीं मजलागीं ॥५७॥
चतुर्दश वर्षें निराहार ॥ काननीं श्रमलासीं तूं फार ॥
आज समरांगणीं साचार ॥ सावकाश निद्रा करीं ॥५८॥
सौमित्र म्हणे तूं कोणाचा कोण ॥ तंव तो लहू बोले हांसोन ॥
तुज पुसावया काय कारण ॥ आला बाण सांभाळीं ॥५९॥
लहू निधडा प्रचंड वीर ॥ सोडी एक सबळ शर ॥
रथासहित सौमित्र ॥ आकाशपंथें उडविला ॥१६०॥
गरगरां गगनी भोंवे रथ ॥ भूमीवरी पडे अकस्मात ॥
मग दुजे रथी सुमित्रासुत ॥ आरूढला लवलाहे ॥६१॥
जैसा कां वर्षे घन ॥ तैसा बाण सोडी लक्ष्मण ॥
लहू त्याचिया त्रिगुण ॥ शर सोडीत सतेज ॥६२॥
ऊर्मिलापतीचे बाण ॥ तटतटां टाकी तोडून ॥
मग मंत्र जपोनि लक्ष्मण ॥ शर सोडोनि देतसे ॥६३॥
त्या शरापासून एकदा ॥ निघाल्या कोट्यवधि गदा ॥
विमानीं सकळ सुरवृंदा ॥ आश्चर्य तेव्हां वाटले ॥६४॥
तो लहू जपे गुरुमंत्र ॥ चक्रें सोडिली तेव्हां अपार ॥
गदा छेदोनि समग्र ॥ चक्रें सवेंचि गुप्त जाहली ॥६५॥
तों सौमित्रें सोडिले पर्वत ॥ सवेचि लहू वज्र प्रेरित ॥
फोडिले अचळ समस्त ॥ वज्र जात स्वस्थाना ॥६६॥
मंगळाचा भाचा लहू वीर ॥ सूर्यवंशमंडणाचा कुमर ॥
शरमुखीं द्वादश दिनकर ॥ स्थापोनियां सोडिले ॥६७॥
निघतां द्वादश आदित्य मेळ ॥ प्रतापें लोपला विरिंचिगोळ ॥
ऐसें देखतां फणिपाळ ॥ राहुअस्त्र सोडित ॥६८॥
सूर्य आणि राहुअस्त्र ॥ दोनी जाहलीं एकत्र ॥
सवेंच गुप्त जाहली क्षणमात्र ॥ नलगतां ते काळीं ॥६९॥
कामास्त्र सोडी अहिनायक ॥ लहूवीरे प्रेरिलें कामांतक ॥
कामास्त्र दग्ध जाहलें तात्कालिक ॥ नामें पातक हरे ज्यापरी ॥१७०॥
सौमित्रें सोडिलें तारकास्त्र ॥ लहू प्रेरी षण्मुखास्त्र ॥
विघ्नास्त्र सोडी सौमित्र ॥ हेरंबास्त्र लहू टाकी ॥७१॥
सौमित्र सोडी सरितापति ॥ लहू त्यावरी प्रेरी अगस्ति ॥
मग त्यावरी ऊर्मिलापति ॥ पावकास्त्र प्रेरितसे ॥७२॥
लहूनें मेघास्त्र प्रेरून ॥ विझविला प्रचंड अग्न ॥
जैसें प्रकटतां आत्मज्ञान ॥ जाय वितळोन प्रेममोह ॥७३॥
वातास्त्र प्रेरी ऊर्मिलानाथ ॥ लहू आड घाली पर्वत ॥
असो साठ अक्षौहिणी गणित ॥ रामसेना पाडिली ॥७४॥
आश्चर्य करी लक्ष्मण ॥ म्हणे याचा पार न कळे पूर्ण ॥
हातासीं कदा न ये श्यामकर्ण ॥ आतां यज्ञ कायसा ॥७५॥
हे असती कोणाचे कोण ॥ हे कदा न कळे वर्तमान ॥
मज वाटे शिव आणि रमारमण ॥ बाळवेषें प्रकटले ॥७६॥
आणिकांची नव्हे शक्ति ॥ हे त्रिभुवनासी नाटोपती ॥
असो लहू म्हणे सौमित्राप्रति ॥ कां रे उगाचि निवांत ॥७७॥
तुझे सरले असतील बाण ॥ तरी जाईं अयोध्येसी परतोन ॥
तुझा कैवारी रघुनंदन ॥ घेऊनि येई सत्वर ॥७८॥
सौमित्र नेदी प्रत्युत्तर ॥ विलोकी बाळांचा मुखचंद्र ॥
मागुती क्रोध उचंबळतां अपार ॥ सोडिले शर सौमित्रें ॥७९॥
भोगींद्रअवतार लक्ष्मण ॥ हें भूमिजासुतें जाणोन ॥
प्रेरिला नादास्त्र बाण ॥ नवल पूर्ण वर्तले ॥१८०॥
असंभाव्य नाद मंजुळ ॥ ध्वनीनें भरला ब्रह्मांडगोळ ॥
धनुष्य टाकूनि फणिपाळ ॥ नादब्रह्मीं मिसळला ॥८१॥
जे कनकबीज भक्षिती ॥ त्यांचे आंगीं संचरें भ्रांति ॥
ऊर्मिलापतीची गति ॥ तैसीच जाहली तेधवां ॥८२॥
नादास्त्र बाण हृदयीं भरला ॥ जैसा विखार बिळीं प्रवेशला ॥
त्यावरी नादरंगें व्यापिला ॥ भूतळी पडिला मूर्च्छित ॥८३॥
इकडे सैन्याचे चोवीस आवर्त ॥ कुशाभोंवते घातले अद्‌भुत ॥
ते संहारून समस्त ॥ काळजित मारिला ॥८४॥
विभांडोनि दोनी दळें ॥ दोनी बंधू एकवटले ॥
रण अपार तेथें पडिलें ॥ कुंजर मोकळे धांवती ॥८५॥
नाहीं रथस्वामी सारथी ॥ रिते रथ तुरंग ओढिती ॥
सैरावैरा चौताळती ॥ सव्य अपसव्य रणांगणीं ॥८६॥
असो अयोध्येंत कोदंडपाणी ॥ सांगें गुज भरताचे कर्णीं ॥
म्हणे आणिक सेना घेऊनी ॥ साह्य जाईं सौमित्रासी ॥८७॥
दारुण योद्धा तो लक्ष्मण ॥ त्याप्रति सांगें इतुकें वचन ॥
कीं बाळक दोघेजण ॥ जितेच धरून आणावे ॥८८॥
ते जिवें न मारावे सर्वथा ॥ आकांत करील त्यांची माता ॥
तरी बाण आंगीं न खुपतां ॥ मोहनास्त्र घालोनि धरावे ॥८९॥
त्यांचीं माता -पिता कोण ॥ धनुर्वेद गुरु संपूर्ण ॥
कां हिंडतां वनोपवन ॥ वर्तमान सर्व पुसावें ॥१९०॥
त्यांच्या स्वरूपाची आकृति ॥ कोणासारिखे दोघे दिसती ॥
धरूनि आणा त्वरितगती ॥ रथावरी घालोनियां ॥९१॥
सौमित्राचा क्रोध दारुण ॥ घेईल बाळकांचा प्राण ॥
अन्याय केला तरी पूर्ण ॥ कृपा करावी बाळकांवरी ॥९२॥
ज्याचें हृदय परम कोमळ ॥ ते दृष्टीं देखतांचि बाळ ॥
स्नेहें द्रवेल तत्काळ ॥ अग्नि संगें घृत जैसें ॥९३॥
बाळकाविणें शून्य मंदिर ॥ आमुचें पडलें कीं साचार ॥
गुणसरिता ॥ सीता सुंदर ॥ विवेक न करिता त्यागिली ॥९४॥
ऐसें बोलतां रघुनाथ ॥ कंठ जाहला सद्‌गदित ॥
नयनीं सुटले अश्रुपात ॥ प्रिया हृदयांत आठवली ॥९५॥
ऐसें राजीवनेत्र बोलत ॥ तों घायाळ आले धांवत ॥
म्हणती सौमित्र आणि काळजित ॥ सेनेसहित आटिले ॥९६॥
ऐसें ऐकतां राजीवनेत्र ॥ परम चिंतातुर जाहले वानर ॥
श्रीराम म्हणे सर्वेश्वर ॥ अत्यंत कोपला आम्हांवरी ॥९७॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर॥ पुढें वीरश्री माजेल अपार ॥
ते श्रवण करोत श्रोते चतुर ॥ व्युत्पन्न आणि प्रेमळ ॥९८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टत्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥१९९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय एकोणचाळिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
देवाधिदेव राजीवनेत्र ॥ पुराणपुरुष घनश्यामगात्र ॥
लीला दाखविली विचित्र ॥ भक्तजन तारावया ॥१॥
सौमित्र पडिला रणांगणीं ॥ श्रवणीं ऐकतां कोदंडपाणी ॥
शोकाकुलित पडिला धरणीं ॥ सुमंतें सांवरून उठविला ॥२॥
दळ घेऊन अपरिमित ॥ समागमें घेतला हनुमंत ॥
रणाप्रति धांविन्नला भरत ॥ पवनवेगें करूनियां ॥३॥
भरत आणि हनुमंत ॥ रण विलोकिती समस्त ॥
तंव ते सससावोनि सीतासुत ॥ दोघे पुढें पातले ॥४॥
हनुमंताचे कर्णीं समस्त ॥ भरत सांगे गुप्त मात ॥
म्हणे हे राघवाऐसे दिसत ॥ सीतासुत निश्चये ॥५॥
जानकी होती गर्भिणी ॥ तैसीच रामचंद्रे सोडिली वनीं ॥
हनुमंत म्हणे मजही मनीं ॥ ऐसेंच गमें निश्चयें ॥६॥
वैरागरावांचून रत्‍न ॥ सहसा न होय निर्माण ॥
हे जानकीचे नंदन ॥ मजही पूर्ण कळों आले ॥७॥
तों लहूसी म्हणे कुश वीर ॥ पैल ते नर आणि वानर ॥
हळूच करितात विचार ॥ तें तुज कांही समजलें ॥८॥
आम्हां दोघांसी युद्धी गोवूनी ॥ श्यामकर्ण न्यावा सोडोनि ॥
हेंच त्यांनीं धरिले मनीं ॥ सांगती कानीं एकमेकां ॥९॥
तरी तूं रक्षी श्यामकर्ण ॥ त्यांसीं युद्ध करितों मी निर्वाण ॥
ऐसें कुश वीर बोलोन ॥ सरसावून पुढें आला ॥१०॥
धनुष्यासी लावून बाण ॥ भरताप्रती बोले वचन ॥
तूं वडील काय लक्ष्मणाहून ॥ तुझें आंगवण थोर दिसतसे ॥११॥
तुझें नाम काय सांग सत्वर ॥ पिता तुझा कोठील नृपवर ॥
त्वां पूर्वी युद्ध दुर्धर ॥ कोणासीं केलें सांगपां ॥१२॥
माझे नाम पुससील ये क्षणीं ॥ तरी मी वीर कुशेंद्र चूडामणी ॥
या उपरी भरत तये क्षणी ॥ काय बोलता जाहला ॥१३॥
म्हणे लेकुरा तूं जाय येथोन ॥ तुज मी दिधले जीवदान ॥
भरतें मज सोडिलें म्हणोन ॥ सांग आपुले मातेसी ॥१४॥
मग कुश बोले हांसोन ॥ तुझें बंधू पडले दोघेजण ॥
त्यांचा सूड घ्यावया पूर्ण ॥ रामें पाठविलें तुम्हांसी ॥१५॥
युद्ध सांडूनि सांगसी गोष्टी ॥ बंधूचा सूड घेईं उठाउठी ॥
ना तरी आता रणीं दावून पाठी ॥ अयोध्येसीं पळें कां ॥१६॥
पाठमोऱ्यासी न मारीं जाण ॥ तज अभय दिधलें पूर्ण ॥
कोण तुझा आहे रघुनंदन ॥ त्यासी घेऊन येईं वेगें ॥१७॥
ऐसें बोलतां सीतानंदन ॥ भरतें चापासी लावूनि बाण ॥
आकर्णपर्यंत ओढून ॥ कुशावरी सोडिला ॥१८॥
सीतात्मजे शर टाकून ॥ मध्येंच तोडिला तो बाण ॥
सवेंच शरजाळ घालून ॥ कटक बहुत संहारिले ॥१९॥
भरत जे जे अस्त्र सोडित ॥ तें तें न मानी सीतासुत ॥
युद्धविद्या सरली समस्त ॥ सीतासुत नाटोपे ॥२०॥
भरतें प्रेरिलें कार्तवीर्यास्त्र ॥ सहस्रकरांचे प्रकटले वीर ॥
बाण सोती अनवार ॥ हांकें अंबर गाजविती ॥२१॥
ऐसें देखतां राघवकुमरें ॥ भार्गवास्त्र सोडिले त्वरें ॥
कार्तवीर्यास्त्र एकसरें ॥ गुप्त जाहले तेधवां ॥२२॥
मग भरते प्रेरिली कालरात्री ॥ तमें दाटली धरित्री ॥
तंव सीतापुत्रें ते अवसरी ॥ द्वादश सूर्य प्रकटविले ॥२३॥
त्या प्रकाशे ते वेळां ॥ विरिंचिगोळ तपों लागला ॥
भरत म्हणे हा कळिकाळा ॥ सर्वथाही नाटोपे ॥२४॥
भरतें सोडिले महिषासुर ॥ कुशें टाकिली शक्ति अनिवार ॥
भरतें सोडिलें त्र्यंबकास्त्र ॥ येरें भस्मासुरास्त्र सोडिलें ॥२५॥
मग कुशेंद्रें ते वेळां ॥ सूर्यमुख बाण काढिला ॥
जैसी मेघांतून निघे चपळा ॥ तैसा गेला त्वरेनें ॥२६॥
भरताचे हृदयीं येऊन ॥ खडतरला दिव्य बाण ॥
स्यंदनावरून उलथोन ॥ भरत खाली पडियेला ॥२७॥
दळ पूर्वीच आटिले समस्त ॥ ऐसें देखोनि हनुमंत ॥
घेऊन एक विशाळ पर्वत ॥ कुशेंद्रावरी धांविन्नला ॥२८॥
भोवंडून बळें भिरकाविला ॥ कुशें वज्रमुख बाण सोडिला ॥
अचळ फोडोन पिष्ट केला ॥ धुरोळा उडाला आकाशीं ॥२९॥
मारुतीचे हृदय लक्षून ॥ सोडिले तेव्हां वज्रबाण ॥
तो वज्रदेही परी मूर्च्छना येऊन ॥ धरणीवरी पडियेला ॥३०॥
इकडे बिभीषण आणि रघुनंदन ॥ विचार करीत बैसले पूर्ण ॥
बाळक हे कवणाचे कोण ॥ युद्ध निर्वाण करिताती ॥३१॥
तों अकस्मात आली मात ॥ रणीं पडला वीर भरत ॥
मूर्च्छना येऊनि हनुमंत ॥ रणांगणीं तळमळे ॥३२॥
बिभीषण म्हणे रघुनाथा ॥ आतां कासया यज्ञ करितां ॥
परमाश्चर्य तत्वतां ॥ जाऊनियां पहावें ॥३३॥
रघुवीर बोले तेव्हा वचन ॥ काळ कैसा परम कठिण ॥
बंधू पडिले तिघेजण ॥ कुलक्षय पूर्ण मांडला ॥३४॥
परम क्रोधावला रघुनंदन ॥ तोडोनि टाकिले यज्ञकंकण ॥
होमद्रव्यें उलंडून ॥ सीतारमण ऊठला ॥३५॥
हडबडली अयोध्या सर्व ॥ निशाणीं न घालितां घाव ॥
रथारूढ होऊनि सर्व ॥ पवनवेगें धांवले ॥३६॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ नळ नीळ शरभ वाळिसुत ॥
अयोध्येचे दळ समस्त परम वेगें धांवत ॥३७॥
वर्षाकाळीं गंगेचे पूर ॥ सागराप्रति जाती सत्वर ॥
तेवीं नरवानरांचे भार ॥ रणसिंधूजवळी पातले ॥३८॥
तिघे बंधू पडिले रणीं ॥ ते नयनीं विलोकी चापपाणी ॥
की नमस्कार घातले धरणीं ॥ तिघांही मिळूनि एकदांचि ॥३९॥
तुझे कन्येस गांजिले व्यर्थ ॥ म्हणोनि पृथ्वीस नमस्कार करित ॥
असो प्रेते देखोनि रघुनाथ ॥ मनीं परम क्षोभला ॥४०॥
दुरोनी मग देखिले नयनीं ॥ श्यामसुंदर बाळें ते क्षणीं ॥
एकाकडे एक पाहोनी ॥ गोष्टी करिती कौतुकें ॥४१॥
कौपीन मौंजी यज्ञोपवीत ॥ तेणें शोभती किशोर अद्‌भुत ॥
माथांची शिखा उडत ॥ दृष्टी नाणिती परदळातें ॥४२॥
असो वृक्ष पाषाण घेऊन ॥ धांवले एकदांचि वानरगण ॥
तों दोघेही धनुष्य चढवून ॥ सरसावून पुढें आले ॥४३॥
आश्चर्य करी रघुनंदन ॥ सोडिती बाणापाठीं बाण ॥
मृगेंद्राऐसें गर्जोन ॥ दोघे वचन बोलती ॥४४॥
घालिती असंभाव्य बाणजाळ ॥ जर्जर केलें वानरदळ ॥
शिळा वृक्ष फोडोनि सकळ ॥ परदळावरी टाकिती ॥४५॥
अनिवार बाळकांचा मार ॥ न सोसवती दारुण शर ॥
प्रेते पडली अपार ॥ उरले वानर पळती भयें ॥४६॥
हनुमंत भावी मनांत ॥ ऊर्ध्वपंथे उतरून अकस्मात ॥
पुच्छें बांधोन दोघे त्वरित ॥ राघवापासी आणावे ॥४७॥
उडों पाहे अंजनीकुमर ॥ तो कुशें टाकिला सबळ शर ॥
त्याच्या हृदयीं आदळोनि सत्वर ॥ बाण पृथ्वीवरी पडियेला ॥४८॥
कुश बोले गर्जोन ॥ मर्कटा उभा राहे एक क्षण ॥
त्वां विध्वंसिले अशोकवन ॥ तें येथें न चले सर्वथा ॥४९॥
टाकोन वृक्षपाषाण ॥ हें राक्षसयुद्ध नव्हे जाण ॥
तों नव्हे रे गिरिद्रोण ॥ उपटून बळें न्यावया ॥५०॥
गोवत्सपद जीवन ॥ पुरुषार्थ भोगिसी समुद्र उडोन ॥
रावणाचें नगर जाळिलें पूर्ण ॥ ते येथें न चलें आम्हांसी ॥५१॥
हा संग्रामसिंधु परम दुर्धर ॥ येथें जय न पावसी तूं वानर ॥
आमचे जननीसी अपार ॥ स्नेह तुझा लागलासे ॥५२॥
ते क्षणक्षणां आठवित ॥ म्हणोनि तुज रक्षिले येथ ॥
उगाच राहें निवांत ॥ अचळवत हनुमंता ॥५३॥
तों वृक्ष घेऊनि सत्वर ॥ पुढें धांविन्नला मित्रपुत्र ॥
बाणघातें तरुवर ॥ लहूनें तोडिला हातींचा ॥५४॥
म्हणे ऐक रे चंडांशुसुता ॥ तो मागील काळ राहिलां आतां ॥
तुम्ही पतितांसी तत्वतां ॥ लावीन शिक्षा आज येथें ॥५५॥
वाळी ज्येष्ठबंधू मारवून ॥ त्याचे स्त्रियेसीं करिसी गमन ॥
ज्याचे बळें कर्म केले पूर्ण ॥ त्याचं ज्ञान कळों आले ॥५६॥
तुम्हां मर्कटांसी कैचें ज्ञान ॥ परी तुज गुरु भेटला जाण ॥
उत्तम न्याय करून ॥ तारा तुज दिधली ॥५७॥
गुरु अपंथें चाले सदा ॥ मग कैंची शिष्यास मर्यादा ॥
असो प्रायश्चित एकदां ॥ घेईं आजि रणांगणीं ॥५८॥
मग घालून सहस्र बाण ॥ रणीं पाडिला सूर्यनंदन ॥
फणसफळावरी कंटक पूर्ण ॥ तैसेचि शर भेदले ॥५९॥
तंव पुढें धांवला जांबुवंत ॥ तयाप्रति कुश वीर बोलत ॥
म्हणे अस्वला तूं निर्बळ बहूत ॥ वृद्ध अत्यंत दृष्टिहीन ॥६०॥
सोडोनियां सहस्र बाण ॥ तोही पाडिला उलथोन ॥
तों घेऊनियां पाषाण ॥ नळ वानर धांविन्नला ॥६१॥
तयाप्रति लहू बोले वचन ॥ म्हणे हे नव्हे सेतुबंधन ॥
पांच बाण सोडून ॥ तोही पाडिला रणभूमीं ॥६२॥
तंव अंगद धांवला सकोप ॥ तयासी बोले रविकुलदीप ॥
रावणाचा सभामंडप ॥ नव्हे पामरा उचलावयाचा ॥६३॥
माझे पाठीसी रिघे येऊन ॥ तुझे पित्याचा मी सूड घेईन ॥
शत्रूची सेवा करितां पूर्ण ॥ लाज न वाटे मर्कटा ॥६४॥
तुझें मातेने केला व्यभिचार ॥ त्याचें प्रायश्चित देईन सत्वर ॥
ऐसें म्हणोनि पांच शर ॥ टाकोनि अंगद पाडिला ॥६५॥
असो अष्ट जुत्पती आणि हनुमंत ॥ रणीं पाडले वीर समस्त ॥
मग कोदंड चढवूनि त्वरित ॥ बाण लावीत राघव ॥६६॥
वेगें सोडिले दश बाण ॥ कुशें शत सोडिले निर्वाण ॥
सहस्र शर रघुनंदन ॥ टाकिता जाहला तयावरी ॥६७॥
कुशें लक्ष बाण सोडिले ॥ राघवें कोटी मोकलिले ॥
बाणमंडपें ते वेळे ॥ झांकुळलें सूर्यबिंब ॥६८॥
रघुपतीचा हस्तवेग बहुत ॥ त्याहूनि विशेष कुशवीर दावित ॥
बाणांचे तेव्हां गणित ॥ लेखित शेषांते न करवे ॥६९॥
अनिवार बाळकें दोनी ॥ नाटोपती रामासी रणीं ॥
यावरी कोदंडपाणी ॥ काय बोले तेधवां ॥७०॥
म्हणे ऋषिबाळक हो ऐका वचन ॥ तुम्हांस भातुकें देईन ॥
करावयासी दुग्धपान ॥ धेनु देईन सवत्स ॥७१॥
मी तुम्हांसी जाहलो प्रसन्न ॥ जें मागाल ते इच्छा पुरवीन ॥
सकळ दुःख दरिद्र हरून ॥ देईन दान वाजी गज ॥७२॥
मग ते देती प्रतिवचना ॥ आम्हांस मागावयास नसे वासना ॥
तूं मागें मनकामना ॥ पूर्ण करूं तुझी आम्हीं ॥७३॥
तुझी तूंच भोगी संपत्ति ॥ आम्ही ऐकिली तुझी कीर्ति ॥
शोधितां हे त्रिजगती ॥ निर्दय नाहीं तुजऐसा ॥७४॥
तुज साधु म्हणेल तरी कोण ॥ व्यर्थ वाळी मारिला कपटेंकरून ॥
जानकीसारिखें चिद्रत्‍न ॥ अन्यायाविण दवडिले ॥७५॥
निष्पाप जैसी भागीरथी ॥ तिजहून पवित्र सीतासती ॥
घोरवनीं टाकिली ही ख्याति ॥ तुज न शोभे राघवा ॥७६॥
ऐसें दोघेही बाळ बोलती ॥ प्रत्त्युत्तर देत रघुपती ॥
मनांत उपजे बहु प्रीती ॥ कीं दोघांप्रति आलिंगावें ॥७७॥
बाळभाषण ऐकोन ॥ वाटे तयांसी द्यावें चुंबन ॥
यापरी ते दोघेजण ॥ म्हणती बाण सोडी वेगीं ॥७८॥
तूं क्षत्रिय म्हणविसी पूर्ण ॥ गोष्टी सांगसी युद्ध टाकून ॥
लीलावतारी रघुनंदन ॥ काय बोले याउपरी ॥७९॥
तुम्ही दोघे कोणाचे कोण ॥ झालेत कोणे वंशीं निर्माण ॥
मातापितयांची नाम खूण ॥ सांग संपूर्ण आम्हांप्रति ॥८०॥
दोघांचे देव्हडेंचि ठाण ॥ दोघांची विद्या समसमान ॥
वेद शास्त्र पुराण रामायण ॥ कोण्या गुरूनें पढविलें ॥८१॥
धनुर्वेद मंत्रास्त्र ॥ कळा कौशल्य युक्ति विचित्र ॥
सद्‌गुरु कोण तुमचा पवित्र ॥ नाम त्याचें सांगा पां ॥८२॥
ऐसें बोलता रघुनाथ ॥ दोघे गदगदां हांसत ॥
रणी बंधु पडले समस्त ॥ त्यांचा खेद सांडिला येणें ॥८३॥
विद्या सरली तुझी सकळिक ॥ रणीं पुससी आतां सोयरिक ॥
कीं बंधु पडले हा धाक ॥ मनीं दचक बैसला तुझा ॥८४॥
तुज पुसावया काय कारण ॥ सोडीं वेगें निर्वाणबाण ॥
बंधूचा सूड घेईं पूर्ण ॥ मग सोयरिक पुसे सुखे ॥८५॥
म्हणती तूं अयोध्येचा नृपवर ॥ वधिले रावणादि असुर ॥
ती अवघी विद्या बाहेर ॥ काढीं आज पाहूं दे ॥८६॥
आम्हीं असों धाकुटें किशोर ॥ तूं पूर्वींचा जुनाट झुंजार ॥
धनुर्वेद पढविला समग्र ॥ गुरु वसिष्ठें तुजलागीं ॥८७॥
तुज एकपत्‍नीव्रत पूर्ण ॥ सत्कीर्ति जानकीतें सोडून ॥
अपकीर्ति कां वरिली दाटून ॥ हें तों दूषण जगीं जाहलें ॥८८॥
युद्ध केल्याविण सर्वथा ॥ आम्ही तुज न सोडूं आतां ॥
भय वाटत असेल चित्ता ॥ तरी पळून जाय अयोध्ये ॥८९॥
दारा कुटुंब तुज नाहीं ॥ आतां संन्यास घेऊन सुखें राही ॥
यावरी जनकाचा ज्येष्ठ जांवई ॥ काय बोलता जाहला ॥९०॥
तुम्ही सांगा आपले वर्तमान ॥ मग मी तुम्हांसी झुंजेन ॥
यावरी कुश बोले हांसोन ॥ ऐकें सावध होऊनि ॥९१॥
जानकी उदरकमळ शुद्ध ॥ त्यांत जन्मलों दोघे मिलिंद ॥
शत्रुकाष्ठें कोरून सुबुद्ध ॥ पिष्ठ करितो रणांगणीं ॥९२॥
वाल्मीकतात गुरु पूर्ण ॥ तेणें आमुचें केलें पाळण ॥
त्यानंतरें मौंजीबंधन ॥ करून वेद पढविले ॥९३॥
सकळ शास्त्रें रामचरित्र ॥ धनुर्वेद पढविला समग्र ॥
तो आमचे मातेचा तात पवित्र ॥ वाल्मीकऋषि जाण पां ॥९४॥
मातेचे कैवारेंकरूनी ॥ भार्गवें निःक्षत्री केली अवनी ॥
तैसेंच आम्ही धरली मनीं ॥ करूं अवनी निर्वीर ॥९५॥
कीं मातृकैवारें विनासुत ॥ उरग संहारी तेव्हां समस्त ॥
तैसेंच करणें आजि येथ ॥ आम्हासही निर्धारें ॥९६॥
त्वां सांडिली जैं सीता सती ॥ तैंच गळाली तुझी शक्ती ॥
अविवेक केला निश्चिती ॥ पुनः मागुती आवरेना ॥९७॥
ऐसें ऐकतां रामचंद्र ॥ सीता आठवूनि दयासमुद्र ॥
हृदय पिटून सर्वेश्वर ॥ धरणीवरी पडियेला ॥९८॥
मूर्च्छना सांवरूनि पुढती ॥ मागुती उठिला रघुपति ॥
पुढें बिभीषण मारुति ॥ तयांप्रति पुसतसे ॥९९॥
म्हणे हे कवणाचे नंदन ॥ मग ते बोलती विचारून ॥
तुमचीं प्रतिबिंबें परिपूर्ण ॥ जानकी उदरी जन्मलीं ॥१००॥
चार घटिका संपूर्ण ॥ निवांत राहिला रघुनंदन ॥
सीता सोडिली त्या दिवसापासून ॥ संपूर्ण दिवस मोजिले ॥१॥
द्वादश वर्षें तीन मास पूर्ण॥ गणित करी जानकीजीवन ॥
तों लहू कुश दोघेजण ॥ एकाप्रति एक बोलती ॥२॥
म्हणती वृक्षाआड बैसोन ॥ काय करितो रघुनंदन ॥
तों कुशें सोडिला एक बाण ॥ वृक्ष छेदोनि उडविला ॥३॥
हस्तकौशल्ये देखोन ॥ हास्य करी जगन्मोहन ॥
म्हणे हे आम्हांलागून ॥ वश नव्हेति कदापि ॥४॥
आतां युद्धचि करावें यथार्थ ॥ म्हणोनि उभा राहिला रघुनाथ ॥
जे जे बाण सोडित ॥ ते ते निष्फळ जात आकाशीं ॥५॥
विमानीं इंद्रादि सुरवर ॥ आश्चर्य करिती तेव्हां थोर ॥
म्हणती रामाचे सामर्थ्य अपार ॥ काय जाहलें ये समयीं ॥६॥
अकाळींचीं अभ्रे व्यर्थ पूर्ण ॥ तैसे निष्फळ जाती रामाचे बाण ॥
मग कुशें मोहनास्त्र संपूर्ण ॥ निजबाणी स्थापिलें ॥७॥
तो मोहनबाण येऊन ॥ रघुनाथ हृदयीं भेदला पूर्ण ॥
मोहें विलोकितां पुत्रवदन ॥ मूर्च्छा येऊन पडियेला ॥८॥
रघुनाथ पडतां भूमंडळी ॥ एकचि हाक चोहींकडे जाहली ॥
पर्वत घेऊनि ते वेळीं ॥ हनुमंत पुढें धांविन्नला ॥९॥
त्यावरी टाकोनिया वज्रबाण ॥ मूर्च्छागत पाडिला न लागतां क्षण ॥
तों गदा घेऊन बिभीषण ॥ हाक देत पुढें आला ॥११०॥
तों कृशें बाण सोडिला ॥ लंकापतीचे हृदयी बैसला ॥
तोही मूर्च्छित पडियेला ॥ नाहीं उरला कोणी तेथें ॥११॥
मग लहू कुश दोघेजण ॥ आले रामाजवळी धांवोन ॥
पिता पाहिला अवलोकून ॥ वंदिले चरण प्रेमभावें ॥१२॥
रघुपतीचा मुकुट काढिला ॥ कुशें आपुलें मस्तकीं घातला ॥
कुंडले कौस्तुभ कटी मेखळा ॥ सर्वही लेइला कुश तेव्हां ॥१३॥
सौमित्राची भूषणें काढोनी ॥ लहू लेइला तेच क्षणीं ॥
मग श्यामकर्ण घेउनी ॥ दिव्य रथी बैसले ॥१४॥
लहू म्हणे दादा परियेसी ॥ वानर धरून आश्रमासी ॥
नेऊन दाखवूं मातेसी ॥ खेळावयासी सर्वदा ॥१५॥
मग नळ नीळ सुग्रीव मारुती ॥ यांचीं पुच्छें धरून हाती ॥
जांबुवंत अंगद ते क्षितीं ॥ ओढीतचि चालविले ॥१६॥
अंगे खरडती भूमीवरी ॥ जांबुवंत म्हणे मारुति अवधारी ॥
ऊठ वेगें झडकरी ॥ युद्ध करूं चला यांशी ॥१७॥
मग म्हणे हनुमंत ॥ पुढें आहे बहुत कार्यार्थ ॥
त्रिभुवननाथ सीताकांत ॥ तोही मूर्च्छित पडियेला ॥१८॥
आतां मेलियाचे मीस घेऊन ॥ घेऊं जानकीचें दर्शन ॥
शक्तीचें सामर्थ्य दारुण ॥ केलें विंदान अतर्क्य हे ॥१९॥
असो आश्रमा आले किशोर ॥ रथाखालीं उतरले सत्वर ॥
अलंकार मंडित सुंदर ॥ आश्रमामाजी प्रवेशले ॥१२०॥
कुश सन्मुख देखिला ॥ जानकीस ऐसा भाव गमला ॥
की रघुनाथचि आला ॥ सरसाविला अंचल ॥२१॥
तंव ते दोघेही कुमार ॥ साष्टांग घालिती नमस्कार ॥
सीतेसि दाटला गहिवर ॥ नंदन हृदयी कवळिले ॥२२॥
सीतेचे कंठीं मिठी घालून ॥ दोघे सांगती वर्तमान ॥
रामासमवेत बंधू चौघेजण ॥ रणांगणीं पहुडविले ॥२३॥
ऐकतांच ऐसी मात ॥ सीता पडली मूर्च्छागत ॥
सवेंच उठली आक्रंदत ॥ हृदय पिटीत ते काळीं ॥२४॥
म्हणे त्रिभुवनेश्वर घनसांवळा ॥ तो रणी तुम्हां केंवि सांपडला ॥
अरे पितृवध कैसा केला ॥ जाणोनियां बाळ हो ॥२५॥
मत्स्ये कैसा सागर शोषिला ॥ जंबुकें मृगेंद्र कैसा धरिला ॥
दीपतेजें काळवंडला ॥ वासरमणि कैसा हो ॥२६॥
तृणप्रहारें भंगले वज्र ॥ कीं पतंगे गिळिला वैश्वानर ॥
सर्षपभारे भोगींद्र ॥ ग्रीवा कैशा दडपिल्या ॥२७॥
मक्षिकेचा पक्षवात सुटला ॥ तेणें मेरु कैसा उलथोनि पडिला ॥
मुंगीचे मुखवातें विदारिला प्रळयमेघ जैसा पां ॥२८॥
तंदुळभारें ऐरावत ॥ कैसा पडिला हो मूर्च्छित ॥
पुष्पप्रहारें अद्‌भुत ॥ पाताळीं कूर्म दुखावला ॥२९॥
तों कुश लहू तेव्हां बोलत ॥ माते ते पडले मूर्च्छागत ॥
आतां उठतील समस्त ॥ चिंता काही न करावी ॥१३०॥
आई आम्ही आणिलीं वानरें ॥ उड्या घेती बहुत सुंदरें ॥
वृक्षास बांधिली समग्रें ॥ पाहीं बाहेरी अंबे तूं ॥३१॥
मग जगन्माता येऊन पाहात ॥ तों हनुमंत नळ नीळ जांबुवंत ॥
वीर देखोनि समस्त ॥ आश्चर्य करी अंतरी ॥३२॥
म्हणे बाळकांचे सामर्थ्य दारुण ॥ महावीर आणिले धरून ॥
म्हणे यांस ओळखी देतां पूर्ण ॥ लज्जायमान होतील हे ॥३३॥
मग पुत्रांसी म्हणे ते अवसरीं ॥ अरे हे वानर ठेवूं नये घरीं ॥
सोडा जाऊं द्या वनांतरी ॥ आपुलिया स्वस्थाना ॥३४॥
मग भोवंडिले पुच्छें करून ॥ दूर दिधले भिकावून ॥
मग ते महावीर उठोन ॥ राघवाकडे पळाले ॥३५॥
रणीं सावध जाहला रघुवीर ॥ तों पळतचि आले वानर ॥
सांगती सर्व समाचार ॥ वाल्मीकाचे आश्रमींचा ॥३६॥
आम्ही मूर्च्छेचे मीस घेऊनि ॥ जाऊन पाहिली जनकनंदिनी ॥
श्यामकर्ण दोघांनी नेऊनि ॥ आश्रमांगणीं पूजिलासे ॥३७॥
तुमचा रथ अलंकार ॥ घेऊन गेले दोघे कुमर ॥
जैसा सुपर्णें जिंकिला श्रीधर ॥ तैसेंच पूर्ण येथे जाहलें ॥३८॥
कीं नंदीनें जिंकिला उमारमण ॥ आपुलेच फळभारेंकरून ॥
वृक्ष जाय कैसा मोडून ॥ तैसेंच येथ जाहलें ॥३९॥
सूर्यापासून जाहले आभाळ ॥ तेणें त्यास आच्छादिलें तत्काळ ॥
ऐसें बोलतां तमालनीळ ॥ उगाच राहिला क्षणभरी ॥१४०॥
तों इकडे वर्तला वृत्तांत ॥ रामासीं झुंजले सुत ॥
उपवनाजवळी बहुत ॥ अपार रण पडियेले ॥४१॥
समाचार ऐकोनि विपरीत ॥ तों पाताळाहून अकस्मात ॥
वाल्मीक मुनि आला धांवत ॥ आश्रमापासीं आपुलिया ॥४२॥
सीतेनें सांगितलें वर्तमान ॥ श्यामकर्ण आणिला धरून ॥
मग वाल्मीक मुनि हांसोन ॥ तेचि क्षणीं ऊठिला ॥४३॥
रणांगणाप्रति येऊन ॥ अद्‌भुत करणी केली पूर्ण ॥
कमंडलूचें उदक शिंपून ॥ दळ अवघें उठविलें ॥४४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ आदिकरून थोर लहान ॥
निद्रिस्थापरी उठोन ॥ उभे केले तें काळीं ॥४५॥
यावरी वाल्मीकें येऊन ॥ श्रीरामासी दिधलें आलिंगन ॥
म्हणे राघवा तूं सर्वज्ञ ॥ कर्तृत्व पूर्ण तुझेंच हें ॥४६॥
सर्वांचा गर्व झाडावया ॥ लीला तुवां केली रघुराया ॥
येर्‍हवी सीता तुजपासूनियां ॥ दूर कोठें गेली पां ॥४७॥
अनंत ब्रह्मांडांचा कर्ता ॥ तो तूं पुराणपुरुष रघुनाथा ॥
लटकेंच बाहेर आतां ॥ नेणतपण धरिसी तूं ॥४८॥
श्रीराम म्हणे युद्ध करूनी ॥ दोघांस जिंकीन समरंगणी ॥
म्यां आपुली निर्वाण करणी ॥ दाविली नाही तयांते ॥४९॥
हांसोनि बोले वाल्मीक ऋषि ॥ हस्ताचा ढका लागला नेत्रासी ॥
तरी क्रोध करून मानसीं ॥ हस्त काय छेदावा ॥१५०॥
भोजन करितां न कळत ॥ जिव्हेसी रुतला दंत ॥
तरी कोणावरी क्षोभ तेथ ॥ करावा सांग राजेंद्रा ॥५१॥
कनक रुसे कांतीवरी ॥ रत्‍न प्रभा घालूं इच्छी बाहेरी ॥
काष्ठ घेऊन निर्धारी ॥ वृक्ष मारी आपुलीं फळे ॥५२॥
गूळ गोडीवरी रुसला ॥ प्रवाहासी गंगा धरी अबोला ॥
प्रभेवरी दीप कोपला ॥ तैसा मांडिला विचार येथें ॥५३॥
हे जगदात्म्या अयोध्यापति ॥ तुझ्या वीर्याची अगाध गति ॥
आत्मा वै पुत्र नामासि निश्चिती ॥ गर्जती श्रुति राघवा ॥५४॥
वाल्मीकाचे बोल ऐकोन ॥ जाहले राघवाचें समाधान ॥
ते दिवसीं सीतारमण ॥ राहिले तेथें परिवारेंसी ॥५५॥
कुश लहू भेटती रघुनंदना ॥ तो सोहळा पाहावया नयना ॥
सकळ राजयांसहित सेना ॥ त्वरेंकरून धांवती ॥५६॥
शत्रुघ्न सुमंत धांवती ॥ हेममय शिबिरें उभी करिती ॥
अयोध्याजन वेगें येती ॥ महोत्साह पहावया ॥५७॥
वसिष्ठादिक मुनीश्वर ॥ कौतुके पाहूं आले सत्वर ॥
हेमांबर सभेसी रघुवीर ॥ सकळांसहित बैसला ॥५८॥
नित्यनेम सारून रघुवीर ॥ नूतन वस्त्रें दिव्य अलंकार ॥
लेवोनियां श्रीरामचंद्र ॥ सभामंडपीं बैसला ॥५९॥
वाल्मीकें आश्रमाप्रति जाऊन ॥ लहू कुश आणि श्यामकर्ण ॥
राघवापाशीं आणून ॥ उभे केले तेधवां ॥१६०॥
इंद्रादि देवगण पाहती ॥ सर्व नृप सादर विलोकिती ॥
म्हणती केवळ रघुत्तमाच्या मूर्ती ॥ दोघे पुत्र दिसती हे ॥६१॥
श्यामसुंदर आकर्णनयन ॥ विशाळ भाळ सुहास्यवदन ॥
पुत्रांसहित रघुनंदन ॥ समसमान तिन्ही मूर्ती ॥६२॥
गर्जली तेव्हां आकाशवाणी ॥ राघवा तुझें पुत्र पाहे नयनीं ॥
जयजयकार करूनी ॥ मस्तक डोलविती सुरवर ॥६३॥
वस्त्रालंकारमंडित पूर्ण ॥ लहु कुश श्रीरामाजवळी येऊन ॥
हातीं तैसेंचि धनुष्यबाण ॥ घालिती लोटांगण पित्यासी ॥६४॥
जाहाला एकचि जयजयकार ॥ वृंदारक वर्षती सुमनसंभार ॥
रामास प्रार्थती नृपवर ॥ पुत्रांसी क्षेम देइंजे ॥६५॥
मग उठोनियां रघुनंदन ॥ हृदयीं धरिलें निजनंदन ॥
मस्तकीं करूनि अवघ्राण ॥ पुढें घेऊनि बैसला ॥६६॥
सकळवेदशास्त्रप्रवीण ॥ वाल्मीकें केलें दोघेजण ॥
पाठ शतकोटी रामायण ॥ बाळ म्हणोनि दाविती ॥६७॥
त्यावरी आरंभिलें गायन॥ अवतारचरित्रें गहन ॥
तीं ऐकतां रघुनंदन ॥ सप्रेम जाहला ते काळीं ॥६८॥
चवदा विद्या चौसष्टी कळा ॥ बाळांनी अभ्यासिल्या सकळा ॥
जैसा करतळींचा आंवळा ॥ अकळिल्या विद्या तैशाचि ॥६९॥
वाल्मीकास म्हणे रघुनाथ ॥ धन्य धन्य तुझें गुरुत्व ॥
विद्याभ्यास युद्ध अद्‌भुत ॥ बाळकांहातीं करविले ॥१७०॥
वाल्मीक वदे प्रत्त्युत्तर ॥ तुझें वीर्यसामर्थ्य परम तीव्र ॥
माझें गुरुत्व साचार ॥ काय करील नुसतेंचि ॥७१॥
सौमित्र भरत शत्रुघ्न ॥ सुमंत सुग्रीव बिभीषण ॥
हनुमंतादि सकळ सैन्य ॥ सीता आणावया चालिलें ॥७२॥
आश्रमापुढें येऊन ॥ घालिती सारे लोटांगण ॥
वाल्मीकें बहुत प्रार्थोन ॥ सीता आणिली बाहेरी ॥७३॥
सकळही सद्रद होऊन ॥ धरिती जगन्मातेचे चरण ॥
पुढें ठेविलें सुखासन ॥ जानकीसी बैसावया ॥७४॥
सकलऋषिपत्‍न्यांची पूजा करूनी ॥ जानकी बैसली सुखासनीं ॥
समुद्रासी भेटावया मंदाकिनी ॥ वेगेंकरून चालली जैसी ॥७५॥
जवळी देखोनि रघुनाथा ॥ खालीं उतरली जगन्माता ॥
वाल्मीक येऊनी तत्वतां ॥ रघुनाथाप्रति बोलतसे ॥७६॥
पंचभूतें शशी आदित्य ॥ रामा तूं साक्षी आहेस हृदयस्थ ॥
निष्पाप जानकी निश्चित ॥ आदिमध्यावसानीं ॥७७॥
माझी धर्मकन्या जनककुमारी ॥ आजिवरी पाळिली म्यां माहेरी ॥
आतां दिधली तुमचे करी ॥ अर्धांगी बैसवीं इयेतें ॥७८॥
तंव ते वदनी आकाशवाणी ॥ सत्य सती हे जनकनंदिनी ॥
मग श्रीरामें आलिंगोनी ॥ अंकावरी बैसविली ॥७९॥
लागला वाद्यांचा गजर ॥ मग वाल्मीकास प्रार्थीं रघुवीर ॥
घऊनी सकळ ऋषीश्वर ॥ अयोध्येसी तुम्ही चला ॥१८०॥
पूर्ण करावया महायज्ञ ॥ सकळिकां मानलें ते वचन ॥
मग वाल्मीकादि मुनिजन ॥ दिव्य वहनीं बैसविले ॥८१॥
जानकीसहित रघुनंदन ॥ रथीं बैसला चंडकिरण ॥
दोघे दोहींकडे नंदन ॥ विराजमान शोभती ॥८२॥
मस्तकीं विराजती दिव्य छत्रें ॥ मित्रपत्रें अतिविचित्रें ॥
निजभक्त अपार चामरें ॥ रघूत्तमावरी ढाळिती ॥८३॥
मकरबिरुदें पुढें चालती ॥ भाट सूर्यवंश वाखाणिती ॥
परम गजरें रघुपती ॥ अयोध्यामाजी प्रवेशला ॥८४॥
कौसल्या सुमित्रा प्रेमेंकरूनी ॥ सीतेस आलिंगिती तये क्षणीं ॥
लहूकुशांवरूनी ॥ मूद ओंवाळी कौसल्या ॥८५॥
सामुग्री पूर्वींच सिद्ध होती ॥ यज्ञदीक्षा घेऊन रघुपती ॥
पूर्ण केली पूर्णाहुती ॥ यज्ञ समाप्ति पावला ॥८६॥
वस्त्रालंकार दक्षिणा अपार ॥ देऊन बोळविले ऋषीश्वर ॥
वर्णित रघुवीरचरित्र ॥ आपले आश्रमाप्रति गेले ॥८७॥
रायांस दिधली पाठवणी ॥ श्रीरामाची आज्ञा घेऊनी ॥
सीतेचा महिमा वर्णित वदनीं ॥ निजनगरप्रति गेले ॥८८॥
बिभीषण सुग्रीव प्राणसखे ॥ गौरवूनियां रघुनायकें ॥
आपुले स्वस्थळाप्रति सुखें ॥ पाठविले तये काळी ॥८९॥
जानकीकुमरांसमवेत ॥ अयोध्येचें राज्य करी रघुनाथ ॥
ही कथा श्रवण करितां बहुत ॥ अक्षय सुख पाविजे ॥१९०॥
परम संकटहरणी हे कथा ॥ विजयी होय श्रोता वक्ता ॥
पाहतां श्रीरामविजयग्रंथा ॥ सर्व चिंता हरे पैं ॥९१॥
यावरी कथा गोड बहुत ॥ लीला कैसी दावी रघुनाथ ॥
तो शेवटींचा अध्याय यथार्थ ॥ सादर आतां परिसिंजे ॥९२॥
चाळीस अध्याय अवघा ग्रंथ ॥ त्यांत उरला एक गोड बहुत ॥
जैसा मुकुटावरी मणी झळकत ॥ तैसा अध्याय पुढील असे ॥९३॥
ब्रह्मानंदा स्वामी समर्था ॥ श्रीधरवरदा पंढरीनाथा ॥
हा ग्रंथ वाची त्या भक्ता ॥ तूंच रक्षी निजांगें ॥९४॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनचत्वारिंशत्तमोऽध्याय गोड ॥१९५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

॥ अध्याय चाळिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जयजय निगमागमतनू अखिला ॥ वृंदारकवंद्या अजित अमला ॥
असुरसंहारणा परम मंगला ॥ अचळ अढळ अविनाशा ॥१॥
मन्मथवारणविदारक मृगेंद्रा ॥ क्रोधजलदविदारक समीरा ॥
मदतमनाशक भास्करा ॥ परात्परा परमानंदा ॥२॥
मत्सरतृणदाहका वैश्वानरा ॥ मायाचक्रचाळका विश्वंभरा ॥
दंभनगच्छेदका वज्रधरा ॥ भूमिजावरा भयनाशना ॥३॥
अहंद्विपंचमुखदर्पहरणा ॥ मोहघटश्रोत्रसंहारणा ॥
शोकशक्रजितगर्वविदारणा ॥ ऊर्मिलारमणाग्रजा श्रीरामा ॥४॥
तंव कृपेच्या समस्त ॥ संपत आला रामविजय ग्रंथ ॥
शेवटींचा अध्याय रसभरित ॥ वदवीं कैसा असे तो ॥५॥
गतकथाध्यायीं निरूपण ॥ संपले लहुकुशाख्यान ॥
जानकी आणूनियां यज्ञ ॥ अश्वमेघ संपविला ॥६॥
याउपरी एके दिनीं ॥ सिंहासनी बैसला कोदंडपाणी ॥
बंधुवर्ग कर जोडूनी ॥ स्वस्थानीं उभे राहिले ॥७॥
तों कृतांतभगिनीतीरवासी ॥ द्विज प्रजा पातल्या वेगेंसी ॥
जैसे सुर क्षीरसागरासी ॥ जाती गार्‍हाणें सांगावया ॥८॥
तंव भक्तजनसभाभूषित ॥ मुक्तमंडपीं बैसला रघुनाथ ॥
जो कोटि कंदर्पांचा तात ॥ दीनबंधु गुणसिंधु ॥९॥
दूत जाणविती रघुराया ॥ प्रजानन आले भेटावया ॥
येऊं द्या म्हणे लवलाह्या ॥ कोणी पीडिल्या माझ्या प्रजा ॥१०॥
तों मुक्तमंडपासमोर ॥ पातले तेंव्हा प्रजांचे भार ॥
करूनियां जयजयकार ॥ नमस्कार सर्व घालिती ॥११॥
उभे ठाकले समोर ॥ भ्रूसंकेतें विचारी जगदोद्धार ॥
म्हणती यमुनातीरीं क्रूर ॥ महालवणासुर माजला ॥१२॥
महापातकी अत्यंत क्रूर ॥ मुरदैत्याचा कुमर ॥
भानुजेचें पैलतीर ॥ तेथें असुर असे सदा ॥१३॥
प्रजा गाई आणि ब्राह्मण ॥ चांडाळ भक्षितो नित्य मारून ॥
रघुराया तयासी वधून ॥ समस्त जन सुखी करी ॥१४॥
ऐसें ऐकतां कोदंडपाणी ॥ कोदंड आणवी तयेक्षणीं ॥
आरक्तता उदेली नयनी ॥ क्रोध मनीं न सांवरे ॥१५॥
तों शत्रुघ्न पुढें येऊनी ॥ मस्तक ठेविलें श्रीरामचरणीं ॥
म्हणे मज आज्ञा दीजे ये क्षणीं ॥ लवणासुर वधावया ॥१६॥
घेऊनियां चतुरंग दळ ॥ वेगें जाय म्हणे तमालनीळ ॥
लवणासुर वधोनि तत्काळ ॥ प्रजा सुखें राखिजे ॥१७॥
मंत्रशक्ति दिव्य बाण ॥ बंधूस देत रघुनंदन ॥
सीतावधाचे चरण वंदोन ॥ वीर शत्रुघ्न चालिला ॥१८॥
संग्रामसंकेतभेरी ॥ सेवकीं ठोकिल्या ते अवसरीं ॥
तीन अक्षौहिणी दळ बाहेरी ॥ परम वेगें निघालें ॥१९॥
नौका आणूनिया अपार ॥ भानुकन्येचें लंघिले तीर ॥
तो चहूंकडून अपार ॥ ऋषीश्वर पातले ॥२०॥
ऋषी म्हणत हा दैत्य दारुण ॥ पूर्वीं मांधात राजयासी मरण ॥
हस्तें याच्या आलें जाण ॥ बळेंकरून नाटोपे ॥२१॥
शत्रुघ्न बोले तेव्हां वचन ॥ याचें सांगा कैसे मरण ॥
ऋषी म्हणती उमारमण ॥ येणें पूर्वीं आराधिला ॥२२॥
शंकरें स्वहातींचा दिधला शूळ ॥ तेणें बळें संहारीं विश्व सकळ ॥
तरी तो शूळ घेतां तत्काळ ॥ मरण त्यास तेणेंचि पैं ॥२३॥
तो शूळ ठेवूनियां मंदिरीं ॥ आहारालागी हिंडे दिवस रात्रीं ॥
श्वापदें गोब्राह्मण मारी ॥ शोधूनियां साक्षेपें ॥२४॥
तरी तो काळ साधून ॥ आधीं घ्यावें तयाचें दर्शन ॥
शूळ हातीं चढतांचि पूर्ण ॥ बळ क्षीण नव्हे तयाचें ॥२५॥
त्याचिया भयेंकरून ॥ ओस पडिलें मथुरापट्टण ॥
तें शत्रुघ्नें ओलांडून ॥ काळ साधून चालिला ॥२६॥
लवणासुर नसतां सदनीं ॥ मंदिर तयाचे पाहे उघडोनी ॥
तो शुळ ठेविलासे पूजोनी ॥ उचली तेक्षणीं दाशरथी ॥२७॥
शूळ घेऊनि कैकयीनंदन ॥ दळभारेंसी सिद्ध पूर्ण ॥
उभा ठाकला तों लवण ॥ वनींहून परतला ॥२८॥
गाई ब्राह्मण मारून ॥ प्रेतभार मस्तकीं घेऊन ॥
तों वेष्टिलें देखे सदन ॥ मानववीरदळेंसी ॥२९॥
नयनीं देखतां मानवभार ॥ परम आनंदला लवणासुर ॥
म्हणे ईश्वर मज आहार सदाप्रति पाठविला ॥३०॥
कृतावंत हाक फोडूनी ॥ लवणें शत्रुघ्नासी देखोनी ॥
परम क्रोधें आला धांवूनी ॥ तों शूळ हिरोनी नेलासे ॥३१॥
मग क्रोधावला दारुण ॥ म्हणे तूं मनुष्याचा नंदन ॥
तुज मारून अयोध्यापट्टण ॥ क्षणमात्रें घेईन आतां ॥३२॥
माझा मातुल रावण ॥ रामें मारिला कपटेंकरून ॥
परी त्या राघवासी वधून ॥ सीता आणीन बळेंचि ॥३३॥
तुम्हां चौघांस मारून ॥ मातुळाचा सूड घेईन ॥
आजि प्रथम अवदान ॥ तुझें घेईन शत्रुघ्ना ॥३४॥
लवणासी म्हणे शत्रुघ्न ॥ मशका तुज येथेंच वधीन ॥
जैसा मारावया मत्कुण ॥ उशीर कांही न लागेचि ॥३५॥
वृक्ष उपटोनि सत्वर ॥ वेगीं धांवला लवणासुर ॥
तों शत्रुघ्नें सोडिला शर ॥ चापावरी लावूनियां ॥३६॥
तेणें तो वृक्ष छेदिला ॥ असुरें पर्वत भिरकाविला ॥
तोही कैकयीनंदनें फोडिला ॥ क्षणमात्र न लागतां ॥३७॥
कोट्यानकोटी बाण ॥ शत्रुघ्नें मोकलिले दारुण ॥
परी तो न मानीच लवण ॥ बाण तृणवत तयासी ॥३८॥
जैसा कां वर्षे घन ॥ तैसे टाकी वृक्ष पाषाण ॥
ते बाण वरी फोडोन ॥ वीर शत्रुघ्न टाकीतसे ॥३९॥
मग शत्रुघ्नें तये वेळां ॥ बाण विचारून काढिला ॥
जो कमळासनें निर्मिला ॥ मधुकैटभवधालागीं ॥४०॥
विधीनें तो बाण तत्वतां ॥ रघुपतीसी दिधला होता ॥
तो लवणवधासी निघतां ॥ रामें दिधला शत्रुघ्ना ॥४१॥
तो बाण शत्रुघ्नें योजिला ॥ जैसी प्रकटली प्रळयचपळा ॥
तैसा चापापासोनि सुटला ॥ वेगें आला लवणावरी ॥४२॥
तेणें डळमळिलें भूमंडळ ॥ देवांस विमानीं सुटला पळ ॥
वज्रें चूर्ण होय अचळ ॥ तैसा हृदयीं भेदला ॥४३॥
मेरूवरूनि पडे ऐरावत ॥ तैसा जाहला असुरदेहपात ॥
प्राण निघोनि गेला त्वरित ॥ पडिले प्रेत धरणीवरी ॥४४॥
विजयी जाहला शत्रुघ्न ॥ सुमनें वर्षती सुरगण ॥
तत्काळ मथुरापट्टण ॥ प्रजा नेऊन भरियेले ॥४५॥
जैसें अयोध्यापुर सुंदर ॥ तैसेंच मथुरा जाण नगर ॥
देश भरला समग्र ॥ दुःख दरिद्र पळालें ॥४६॥
जय पावला शत्रुघ्न ॥ कळलें रघुपतीस वर्तमान ॥
छत्र चामरादि संपूर्ण ॥ राजचिन्हें पाठविली ॥४७॥
शत्रुघ्नावरी धरून छत्र ॥ केला मथुरेचा नृपवर ॥
समुद्रापर्यंत समग्र ॥ देश तयासी दीधला ॥४८॥
तों अयोध्येमाजी ते वेळें ॥ एक नवल परम वर्तले ॥
एकादश सहस्र वर्षे केले ॥ अयोध्येचें राज्य श्रीरामें ॥४९॥
रामराज्यामाजी मृत्य ॥ अकाळीं नसेच सत्य ॥
तंव तेथे एक ब्राह्मणसुत ॥ मरण अकस्मात पावला ॥५०॥
झालें त्याचे व्रतबंधन ॥ तों सवेंच पावला मरण ॥
तंव पित्यानें उचलोन ॥ राजद्वारा आणिला ॥५१॥
राघवास म्हणे ब्राह्मण ॥ त्वां काय केलें दोषाचरण ॥
अकाळीं बाळ पावला मरण ॥ करी प्रयत्‍न लवकरी ॥५२॥
परम चिंताक्रांत रघुनाथ ॥ तंव पातला कमलोद्‌भवसुत ॥
सीताकांतें वृत्तांत ॥ नारदासी सांगितला ॥५३॥
नारद म्हणे जानकीपती ॥ कोणी तप करितो शूद्रयाती ॥
त्या पापेंकरूनि निश्चितीं ॥ ऋषिकुमर निमाला ॥५४॥
तप करणें हा ब्राह्मणांचा धर्म ॥ इतरांसी तो सहजचि अधर्म ॥
शूद्र तप आचरतां परम ॥ अकाळीं मरण होय पैं ॥५५॥
ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ राम चिंती पुष्पकविमान ॥
तें तत्काळ आलें धांवोन ॥ राघवें बाहिलें म्हणोनियां ॥५६॥
प्रधान सेनेसहित तत्काळ ॥ वरी आरूढे तमालनीळ ॥
शोधूं लागला पृथ्वीमंडळ ॥ गुहा अचळ कठीण स्थानें ॥५७॥
जो जो तपस्वी दृष्टी दिसे ॥ तयास कोणी जाती राघव पुसे ॥
तंव ते बोलती त्याचिसरसे ॥ श्रेष्ठवर्ण ब्राह्मण ॥५८॥
तयांसी राघव नमून ॥ करी मग तयांचे पूजन ॥
याचपरी उर्वीं संपूर्ण ॥ रघुनंदन शोधितसे ॥५९॥
दक्षिणपंथें शोधी श्रीराम ॥ तों लागले निबिड परम ॥
गिरीकंदरीं एक अधम ॥ किरात तप करीतसे ॥६०॥
तेणें आरंभिले धूम्रपान ॥ तयास पुसे जनकजारमण ॥
म्हणे कोण वेद कोण वर्ण ॥ तप किमर्थ आरंभिले ॥६१॥
तंव तो म्हणे मी किरात ॥ स्वर्गानिमित्त तप करितों येथ ॥
ऐकतां कोपला जानकीनाथ ॥ म्हणे हा आचरत परम अधर्म ॥६२॥
बाण तीक्ष्ण परम चपळ ॥ छेछिलें त्याचें कंठनाळ ॥
तो उद्धरूनि तत्काळ ॥ स्वर्गलोक पावला ॥६३॥
तो विमानीं बैसोन अमरनाथ ॥ रघुनाथासी येऊनि भेटत ॥
म्हणे बरा वधिला किरात ॥ पुरले मनोरथ देवांचे ॥६४॥
सीतावल्लभा रघुनंदना ॥ पुराणपुरुषा गुणसंपन्ना ॥
मज कांहीं सांगावी आज्ञा ॥ ते मी सिद्धी पाववीन ॥६५॥
रघुनाथ म्हणे ऋषिनंदन ॥ अयोध्येंत पावला मरण ॥
तयासी द्यावें जीवदान ॥ सहस्रनयन अवश्य म्हणे ॥६६॥
इंद्रआज्ञेंकरून ॥ परतला ऋषिपुत्राचा प्राण ॥
जैसा ग्रामासी जातां पंथीहून ॥ येत परतोन माघारा ॥६७॥
बहुतांचे सुत त्यावेगळे ॥ पूर्वीं होते जे निमाले ॥
तेही इंद्रें आणोनि दिधले ॥ तद्रूप तैसेच पूर्ववत ॥६८॥
उसनी जेवीं वस्तु नेत ॥ ती परतोनि तैसीच देत ॥
तैसे तयांचे त्यांसी सुत ॥ अमरेश्वरें दीधले ॥६९॥
असो इकडे अयोध्यापती ॥ अगस्तीच्या काननाप्रती ॥
जाता जाहला सहजगती ॥ वनें उपवनें विलोकित ॥७०॥
तों पुढें दोन पक्षी येऊन ॥ राघवासी घालिती लोटांगण ॥
म्हणती आमचा वाद निवडोन ॥ पुढें जावें राघवेंद्रा ॥७१॥
तें रघुत्तमें ऐकोन ॥ स्थिर केले विमान ॥
तों उलूक गृध्र दोघेजण ॥ बोलते जाहले तेधवां ॥७२॥
दिवाभीत बोले वचन ॥ गृह माझे पूर्वींहून ॥
हा गृध्र मज दवडून ॥ बळेंच येथे नांदतो ॥७३॥
मग गृध्र वचन बोलत ॥ उगेंच पीडितो दिवाभीत ॥
गृह माझें यथार्थ ॥ बहुकाळ येथेंचि ॥७४॥
प्रधानास म्हणे सीतावर ॥ यांचा वाद निवडावा सत्वर ॥
सत्य निवडोन मंदिर ॥ ज्याचें त्यास देइंजे ॥७५॥
तों गृध्र बोले पापमती ॥ जंव येथें पृथ्वी नव्हती ॥
तों या वृक्षावरी निश्चितीं ॥ गृह माझें म्यां रचियेलें ॥७६॥
दिवाभीत बोले वचन ॥ ईश्वरें पृथ्वी केली निर्माण ॥
मग वृक्ष वाढला पूर्ण ॥ म्यां सदन निर्मिलें तैं ॥७७॥
प्रधान म्हणे गृध्र सत्य ॥ बहुत काळाच्या गोष्टी सांगत ॥
ऐकोनि हांसिन्नला रघुनाथ ॥ म्हणे केवीं हा अर्थ निवडिला ॥७८॥
पृथ्वी वृक्षासी आधार ॥ नीडासी आश्रय तरुवर ॥
दुरात्मा गृध्र साचार ॥ उलूकालागीं पीडितसे ॥७९॥
निवडूनि यथार्थ व्यवहार ॥ राम उलूकासी देत मंदिर ॥
म्हणे हा गृध्र चांडाळ थोर ॥ यासी वधीन मी आतां ॥८०॥
बाण काढिला तये क्षणीं ॥ तंव गर्जिली तेथें आकाशवाणी ॥
म्हणे हे राम कोदंडपाणी ॥ यासी न मारीं सर्वथा ॥८१॥
हा पूर्वी भूपति ब्रह्मदत्त ॥ गौतम ऋषीचा अंकित ॥
तों याचे सदना अकस्मात ॥ भोजना आला गौतम ऋषि ॥८२॥
तयासी येणें मांस वाढिले ॥ देखतां गुरूचे मन क्षोभले ॥
तत्काळ यासी शापिलें ॥ गृध्र होय म्हणूनियां ॥८३॥
मग हा लागला गुरुचरणी ॥ उःशाप बोले गौतम मुनि ॥
रामदर्शन होतां ते क्षणीं ॥ जासी उद्धरून स्वर्गातें ॥८४॥
ऐसें देववाणी बोलत ॥ तों विमान पातलें अकस्मात ॥
दिव्य देह पावल ब्रह्मदत्त ॥ भावें नमीत रामचंद्रा ॥८५॥
स्तवोनियां कोदंडपाणी ॥ तत्काळ बैसला विमानीं ॥
रघुवीरप्रतापेंकरूनी ॥ स्वर्गी सुखी राहिला ॥८६॥
असो कलशोद्‌भवाचे आश्रमासी ॥ येता जाहला अयोध्यावासी ॥
साष्टांग नमून ऋषिसी ॥ राघव उभा राहिला ॥८७॥
बहुत करून आदर ॥ आश्रमीं पूजिला रघुवीर ॥
हस्तकंकण एक सुंदर ॥ ऋषीनें दिधलें राघवा ॥८८॥
पृथ्वीचे मोल संपूर्ण ॥ ऐसें एक एक जडलें रत्‍न ॥
तें सीतावल्लभें देखोन ॥ घटोद्‌भवाप्रति पुसतसे ॥८९॥
म्हणे यासी निर्मिता चतुरानन ॥ स्वर्गीची वस्तु प्रभाघन ॥
मनुष्यांसी दुर्लभ पूर्ण ॥ तुम्हांस कैसी लाधली ॥९०॥
मग अगस्ति ते कथा सांगत ॥ पैल ते सरोवरीं पाहें प्रेत ॥
वैदर्भदेशींचा नृपनाथ ॥ पुण्यवंत तपोराशी ॥९१॥
दानें केलीं अपरिमित ॥ रामा तप आचरला बहुत ॥
परी अन्नदान किंचित ॥ घडलें नाही यापासूनि ॥९२॥
स्वर्गास गेला तो नृपनाथ ॥ परी क्षुधेनें पीडिला अत्यंत ॥
मग तयासी म्हणे पह्यजात ॥ नाहीं भक्षार्थ तुज येथें ॥९३॥
नाही केलें अन्नदान ॥ येथें न पाविले दिधल्याविण ॥
तरी तूं भूतळाप्रति जाऊन ॥ आपलें प्रेत भक्षीं कां ॥९४॥
तूं भक्षितां नित्यकाळ ॥ मांस वाढेल बहुसाल ॥
मग तो विमानीं बैसोन भूपाळ ॥ नित्यकाळ येत तेथें ॥९५॥
तों तें आपुलें प्रेत भक्षून ॥ स्वर्गासी जाय परतोन ॥
अन्नोदकाएवढे दान ॥ दुजें नाहीं राघवा ॥९६॥
भाग्य ते वैराग्य निश्चित ॥ दैवत एक सद्‌गुरुनाथ ॥
शांतिसुखाहून अद्‌भुत ॥ दुजें सुख नसेचि ॥९७॥
तिथींमाजी द्वादशी श्रेष्ठ ॥ कीं मंत्रांत गायत्री वरिष्ठ ॥
कीं तीर्थामाजीं सुभट ॥ प्रयागराज थोर जैसा ॥९८॥
तैसें दानांमाजी अन्नदान ॥ राघवा अत्यंत श्रेष्ठ पूर्ण ॥
असो त्या रायासी कमलासन ॥ बोलता झाला ते काळीं ॥९९॥
म्हणे अगस्तीचे होतां दर्शन ॥ तुझें कर्म खंडेल गहन ॥
तंव एके दिवशीं येऊन ॥ प्रेत भक्षी नृपवर ॥१००॥
तें म्यां अकस्मात देखिलें ॥ कृपेनें हृदय माझें द्रवलें ॥
मग म्यां वरदान दीधले ॥ कर्म खंडले तयाचे ॥१॥
मग तो वैदर्भराजा तेथून ॥ करी स्वर्गी अमृतपान ॥
तेणें गुरुपूजेसी संपूर्ण ॥ मज हे कंकण समर्पिले ॥२॥
देवांचे अंश रत्‍नावरी ॥ चिंतित मनोरथ सिद्ध करी ॥
ऐसें ऐकोनि अयोध्याविहारी ॥ घाली करीं कंकण तें ॥३॥
राघव म्हणे महाऋषी ॥ दंडकारण्य म्हणती यासी ॥
याची पूर्वकथा आहे कैसी ॥ ते मजपासी सांगिजे ॥४॥
अगस्ति म्हणे मित्रकुळीं देख ॥ मनूचा पुत्रइक्ष्वाक ॥
तयाचा पुत्र दंडक ॥ तो निघाला मृगयेसी ॥५॥
तों काननी ऋषिआश्रम बहुत ॥ दंडक जाय पहात पहात ॥
तंव भृगूचा आश्रम देखत ॥ शोभिवंत अत्यंत जो ॥६॥
तेथें रा बैसला क्षणभरी ॥ तंव भृगुऋषि नव्हता मंदिरीं ॥
घरीं तयाची होती कुमारी ॥ अरजा नाम तियेचें ॥७॥
देखोनियां एकांत ॥ कामातुर होत तो नृपनाथ ॥
परी ते बाळ असे अत्यंत ॥ दशवर्षांची कुमारिका ॥८॥
दंडकें धरूनियां बळें ॥ ऋषिकन्येप्रति भोगिलें ॥
शरीर तिचे अचेतन पडलें ॥ दंडक गेला तेथोनी ॥९॥
भृगु आश्रमासी आला त्वरित ॥ देखा कन्या पडली मूर्च्छित ॥
ऋषी वार्ता सांगता समस्त ॥ दंडके अनर्थ केला हा ॥११०॥
ऋषी क्षोभला जैसा कृतांत ॥ दंडकासी तेव्हां शापित ॥
म्हणे सेना प्रजा देश समस्त ॥ वनें पट्टणें सर्वही ॥११॥
वृक्ष तोय तृण धान्य ॥ तुझे वंशासहित प्रधान ॥
चांडाळा जाय रे भस्म होऊन ॥ सप्त दिन न लागतां ॥१२॥
ऐसें बोलतां विप्रोत्तम ॥ सर्वही जाहले तेव्हां भस्म ॥
नाहीं उरलें वृक्षाचें नाम ॥ पक्षी तोय मग कैंचें ॥१३॥
बहुत काळपर्यंत ॥ शून्य देश पडिला समस्त ॥
पुढें नारदें कलह बहुत पर्वतांमाजी लाविला ॥१४॥
मेरु आणि विंध्याचळ ॥ उंचावले भांडती सबळ ॥
खळबलें सूर्यमंडळ ॥ सृष्टि सकळ हडबडली ॥१५॥
विंध्याद्रिं नाटोपे साचार ॥ सूर्याविण पडला अंधकार ॥
मग मिळोनि ऋषि निर्जर ॥ मजप्रति येऊनि प्रार्थिती ॥१६॥
तुजविण विंध्याचळ ॥ नाटोपे कोणासी परम खळ ॥
तूं दक्षिणेसी जायीं तात्काळ ॥ तीर्थयात्रा करावया ॥१७॥
मग ती वारणसी टाकून त्वरित ॥ दक्षिणेंस आलों ऋषींसहित ॥
मज देखतां विंध्याचळ पडत ॥ पृथ्वीवरी आडवा ॥१८॥
तयासी मी बोलिलों वचन ॥ जों मी माघारा येईं परतोन ॥
तोंवरी न उठावें येथून ॥ उठल्या शापीन क्षणार्धें ॥१९॥
शापधाकें पर्वत ॥ अद्यापि न उठेचि यथार्थ ॥
मग उगवला आदित्य ॥ लोक समस्त सुखी जाहले ॥१२०॥
तें हें दंडकारण्य ओस ॥ ऋषीसह म्यां केला वास ॥
इंद्रासी सांगून बहुवस ॥ मेघवृष्टि करविली ॥२१॥
आणि धनधान्य बीजें बहुत ॥ तींही वर्षला अमरनाथ ॥
मग देश वसला अद्‌भुत ॥ दोष दुष्काळ निमाला ॥२२॥
तैंपासूनि दंडकारण्य ॥ राघवा म्हणती यालागून ॥
असो यावरी आज्ञा घेऊन ॥ रघुनंदन निघाला ॥२३॥
पुष्पकारूढ रघुवीर ॥ अयोध्येसी पातला सत्वर ॥
तों ऋषीश्वर घेऊन कुमर ॥ रामदर्शना पातले ॥२४॥
म्हणती धन्य धन्य रघुत्तमा केले ॥ मृतपुत्रां माघारें आणिलें ॥
यशाचें पर्वत उंचावले ॥ मेरूहून आगळे बहुत ॥२५॥
मुक्तमंडपीं रघुनाथ ॥ शोभला तेव्हां जानकीसहित ॥
भोंवते बंधु तिष्ठत ॥ पुढें हनुमंत उभा सदा ॥२६॥
श्रीरामविजय ग्रंथ पावन ॥ उत्तराकांड सुरस गहन ॥
पुढें निजधामा गेला रघुनंदन ॥ हें अनुसंधान न वर्णावें ॥२७॥
तों माध्यान्हीं प्रगटोनि रघुनाथ ॥ म्हणे येथोनि करी ग्रंथ समाप्त ॥
अवतार संपला हे चरित्र ॥ रामविजयी न सांगावे ॥२८॥
मी जन्ममरणाविरहित ॥ अभंग अक्षय शाश्वत ॥
तोच मी ब्रह्मानंद पंढरीनाथ ॥ भीमातीरीं उभा असे ॥२९॥
टाकूनियां चाप शर ॥ दोनी जधनीं ठेवूनि कर ॥
समपाद समनेत्र ॥ उभा साचार मी येथें ॥१३०॥
ऐसी आज्ञा होतां सत्वर ॥ श्रीधरें घातला नमस्कार ॥
करूनियां जयजयकार ॥ रामविजय ग्रंथ संपविला ॥३१॥
चाळीस अध्याय ग्रंथ तत्वतां ॥ तुजप्रति पावों पंढरीनाथा ॥
ब्रह्मानंदा विश्वभरिता ॥ जगदात्मया जगद्‌गुरो ॥३२॥
वाल्मीकिकृत मूळ ग्रंथ ॥ हनुमंतकाव्य गोड बहुत ॥
आणिकही ग्रंथीं सत्यवतीसुत ॥ रामकथा बोलिला ॥३३॥
तेथींचीं संमतें घेऊनी ॥ पंढरीनाथें कृपा करूनी ॥
सांगितलें कर्णीं येऊनी ॥ तेंच लिहिले साक्षेपें ॥३४॥
रामविजय वरद ग्रंथ ॥ कर्ता याचा पंढरीनाथ ॥
श्रीधर नाम हें निमित्त ॥ पुढें केलें उगेंचि ॥३५॥
या ग्रंथासी वरदान ॥ पंढरीनाथें दीधलें आपण ॥
वाचिती पढती जे अनुदिन ॥ होय ज्ञान अद्‌भुत तयां ॥३६॥
ओढवतां संकट महाविघ्न ॥ करितां एक तरी आवर्तन ॥
तात्काळ संकट जाय निरसोन ॥ वातेंकरून अभ्र जैसे ॥३७॥
पांच आवर्तनें करितां पूर्ण ॥ जाती महाव्याधी निरसोन ॥
संतति संपत्ति संपूर्ण ॥ पावेल सत्य निर्धारी ॥३८॥
होऊनियां शुचिर्भूत ॥ दहा आवर्तनें करितां सत्य ॥
पोटीं होईल दिव्य सुत ॥ रधुनाथभक्त प्रतापी ॥३९॥
जरी नव्हे श्रवण पठण ॥ नित्य करितां ग्रंथपूजन ॥
तरी ते घरींचें संकट पूर्ण हनुमंत येऊनि निवारिल ॥१४०॥
अद्यापि चिरंजीव हनुमंत ॥ जे रघुनाथकथा वाचिती भक्त ॥
त्यांस अंतर्बाह्य रक्षित ॥ उभा तिष्ठत त्यांजवळी ॥४१॥
करितां रामकथा श्रवण ॥ सप्रेम सदा वायुनंदन ॥
ग्रंथ वाची त्यापुढें येऊन ॥ कर जोडोनियां उभा राहे ॥४२॥
शुचिर्भूत होऊनी ॥ रामविजय उसां घेऊनी ॥
निद्रा करितां स्वप्नी ॥ मारुति दर्शन देतसे पैं ॥४३॥
ऐसा या ग्रंथाचा चमत्कार ॥ जाणती रामउपासक नर ॥
आधि व्याधि दुःख दरिद्र ॥ जाय सर्वत्र ग्रंथसंग्रहें ॥४४॥
बाळकांड आठ अध्यायवरी ॥ अयोध्याकांड अध्याय चारी ॥
चार अध्याय निर्धारी ॥ अरण्यकांड प्रचंड ॥४५॥
दोन अध्यायीं किष्किंधाकांड ॥ तेथोनि पांच अध्याय रसवितंड ॥
ते सुंदरकांड प्रचंड ॥ लीलाचरित्र मारुतीचें ॥४६॥
दहा अध्याय संपूर्ण ॥ युद्धकांड रसाळ गहन ॥
सात अध्याय परम पावन ॥ उत्तरकांड जाणावें ॥४७॥
ऐसें अध्याय अवघे चाळीस ॥ मिळून रामविजय जाहला सुरस ॥
श्रवण करितां आसपास ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥४८॥
प्रथम अध्यायी मंगलाचरण ॥ गणेशसरस्वतीगुरुस्तवन ॥
वाल्मीकाची उत्त्पत्ति सांगोन ॥ प्रथममाध्याय संपविला ॥४९॥
बंधूसमवेत निश्चिंती ॥ सांगितली रावणाची उत्पत्ती ॥
दशरथलग्नाची गती ॥ द्वितीयाध्यायीं निरूपिली ॥१५०॥
श्रावणवध शृंगीचें आगमन ॥ याग दशरथें केला पूर्ण ॥
त्यावरी हनुमंतजन्मकथन ॥ तृतीयाध्यायीं हेचि कथा ॥५१॥
कौसल्या सुमित्रा कैकयीप्रती ॥ डोहाळे पुसों गेला नृपती ॥
श्रीरामध्यान जन्मस्थिती ॥ चतुर्थाध्यायीं हेचि कथा ॥५२॥
श्रीरामाचे मौंजीबंधन ॥ ब्रह्मचर्य तीर्थाटन ॥
विश्वामित्र मागे रघुनंदन ॥ हें निरूपण पंचमाध्यायीं ॥५३॥
योगवासिष्ठकथन ॥ मायेनें गाधिज केला दीन ॥
वेदांतभागनिरूपण ॥ सहावा संपूर्ण जाणावा ॥५४॥
ताटिका मर्दूनि याग रक्षिला ॥ अहल्योद्धार पुढें केला ॥
सीतेचा जन्म सांगितला ॥ सातव्यामाजी संपूर्ण ॥५५॥
आठव्यामाजी सीतास्वयंवर ॥ आपमानिला दशकंधर ॥
लग्न लागलें जिंकिला फरशधर ॥ आला रघुवीर अयोध्येसी ॥५६॥
राज्यीं बैसतां रघुनाथ ॥ कैकयीनें केला अनर्थ ॥
त्याकरितां दुःखी दशरथ ॥ नवमाध्यायीं हेंचि कथा ॥५७॥
श्रीराम वनासी निघाला ॥ कौसल्येनें शोक केला ॥
जान्हवीतीरा श्रीराम आला ॥ दशमाध्यायीं हेचि कथा ॥५८॥
मग दशरथें त्यागिला प्राण ॥ भरत आला मातुलगृहाहून ॥
भक्तिरस दिव्य निरूपण ॥ गोड बहुत अकरावा ॥५९॥
चित्रकूटीं भेटला रघुनंदन ॥ भरतें बहुत केलें स्तवन ॥
नंदिग्रामीं भरत स्थापन ॥ हें निरूपण बाराव्यांत ॥१६०॥
बहुत ऋषींचे दर्शन ॥ घेता जाहला रघुनंदन ॥
अगस्तीचा महिमा पूर्ण ॥ तेराव्यांत कथियेला ॥६१॥
शूर्पणखा विटंबून ॥ वधिले त्रिशिरा खरदूषण ॥
दशमुखासी वर्तमान ॥ हेचि कथा चवदाव्यांत ॥६२॥
मृग वधूं गेला रघुनंदन ॥ सीता घेऊनि गेला रावण ॥
जटायु वधिला कपटेंकरून ॥ पंधराव्यांत हेचि कथा ॥६३॥
सीताविरहे राम व्यापिला ॥ त्यावरी जटायु उद्धरिला ॥
पंपासरावरीं आला ॥ सोळाव्यांत हेचि कथा ॥६४॥
वाळिसुग्रीवांची उत्पत्ती ॥ मग शक्रसुत वधी रघुपति ॥
सत्रावें अध्यायी निश्चिती ॥ कथा हेचि निश्चयें ॥६५॥
तारेप्रति बोध करून ॥ शुद्धीस गेले वानरगण ॥
समुद्रातीरीं संपातीदर्शन ॥ हें निरूपण अठराव्यांत ॥६६॥
समुद्र उल्लंघून लंका शोधून ॥ रावणसभा विटंबून ॥
विजयी जाहला वायुनंदन ॥ हें चरित्र एकुणिसाव्यांत ॥६७॥
हनुमंतास सीतादर्शन ॥ विध्वंसिलें अशोकवन ॥
वधिला अखया आणि राक्षस संपूर्ण ॥ हेचि कथा विसाव्यांत ॥ ६८॥
इंद्रजिताचें विटंबन ॥ रावणा छळूनि लंकादहन ॥
किष्किंधेसी आला अंजनीनंदन ॥ हेचि कथा एकविसाव्यांत ॥६९॥
ब्रह्मपाशबंधन ॥ मिष घेऊनि वायुनंदन ॥
सागरीं पुच्छ विझवून ॥ सुवेळेसी पातला ॥१७०॥
ब्रह्मपत्र वाचून ॥ समुद्रतीरास आला रघुनंदन ॥
मग बिभीषणें बोधिला रावण ॥ हेचि कथा बाविसाव्यांत ॥७१॥
मग बिभीषण भेटे श्रीरामास येऊन ॥ सागरदर्शन सेतुबंधन ॥
सुवेळेसी आला सीतारमण ॥ हें निरूपण तेविसाव्यांत ॥७२॥
कापट्य दाविलें सीतेसी ॥ मंदोदरी भेटली जनककन्येसी ॥
मग सुग्रीवे त्रासिले रावणासी ॥ कथा हेच चाविसाव्यांत ॥७३॥
अंगदें बोधिला रावण ॥ अपार युद्ध जाहले दारुण ॥
नागपाशीं बांधिले रामलक्ष्मण ॥ हे लीला पंचविसाव्यांत ॥७४॥
प्रहस्तवध मंदोदरीनीति ॥ मग युद्धा आला लंकापति ॥
तो पराभव पावला निश्चतीं ॥ हे चरित्र सव्विसाव्यांत ॥७५॥
जागा केला कुंभकर्ण ॥ त्यावरी युद्ध जाहले दारुण ॥
समरीं घटश्रोत्रें दिधला प्राण ॥ हें निरूपण सत्ताविसाव्यांत ॥७६॥
नरांतकादि सहाजण पाडिले ॥ शक्रजितें शरजाल सोडिलें ॥
मारुती द्रोणाचळ आणि ते वेळे ॥ अठ्ठाविसाव्यांत हेंचि कथा ॥७७॥
निकुंभिलेसी जाऊन ॥ वानरीं होम विध्वंसून ॥
शक्रजितासी मारी लक्ष्मण ॥ एकुणतिसाव्यांत हेचि कथा ॥७७॥
तिसाव्यांत सुलोचना गहिंवर ॥ एकतिसाव्यांत अहिमहिसंहार ॥
शक्ति भेदोनी निर्धार ॥ बत्तिसावा संपूर्ण पैं ॥७९॥
रावणाचा होम विध्वंसून ॥ अपार माजविलें तेव्हां रण ॥
रावण वधोनि स्थापिला बिभीषण ॥ हे चरित्र तेतिसाव्यांत ॥१८०॥
जानकीनें दिव्य देऊन ॥ मग इंद्र वर्षला अमृतपर्जन्य ॥
देवस्थाना गेले स्तवून ॥ हे कथा संपूर्ण चौतिसाव्यांत ॥८१॥
पुष्पकी बैसोन रघुनंदन ॥ घेतलें अगस्तीचें दर्शन ॥
त्यावरी भरतभेटी पूर्ण ॥ हें चरित्र पस्तिसाव्यांत ॥८२॥
नंदिग्रामीं राहिला राघवेश ॥ मग केला अयोध्याप्रवेश ॥
राज्यीं स्थापून रामास वानर गेले स्वस्थाना ॥८३॥
छत्तिसावें अध्यायीं जाण ॥ हेचि कथा असे पूर्णं ॥
एकोणचाळीस अध्यायीं कौतुक गहन ॥ लहूकुशाख्यान गोड पैं ॥८४॥
चाळिसाव्यांत रघुवीरें ॥ मृत्यु पावलीं ऋषींचीं कुमरें ॥
किरात वधोनियां त्वरें ॥ बाळें माघारी आणिली ॥८५॥
चाळीस अध्यायपर्यंत ॥ रामविजय सपूर्ण ग्रंथ ॥
श्रवणमननें पुरे अर्थ ॥ जाणती पंडित विवेकी ॥८६॥
रामविजय ग्रंथ नृपती ॥ चाळिस अध्याय वीर निश्चितीं ॥
दोषदळ संहारिती ॥ प्रचंड प्रतापी वीर हे ॥८७॥
कीं रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हें चाळीस खणांचे दिव्य मंदिर ॥
सीतेसहीत रघुवीर ॥ क्रीडा करित तेथें पैं ॥८८॥
कीं हें चाळिस खणांचे वृंदावन ॥ रघुनाथकथा तुळसी पूर्ण ॥
दृष्टांत ती पत्रें जाण ॥ आवर्तन प्रदक्षिणा भक्त करिती ॥८९॥
रामविजय ग्रंथ मंदिर ॥ चाळीस कोठड्या अति सुंदर ॥
साहित्य द्रव्य अपार ॥ माजी भरलें न गणवें ॥१९०॥
कीं ग्रंथ हा वासरमणी ॥ वेष्टिला असे दृटांत किरणीं ॥
कीं साहित्य तारागणीं ॥ ग्रंथचंद्र वेष्टिला ॥९१॥
कीं ग्रंथ हाचि रघुवीर ॥ दृष्टांत हे त्याचे वानर ॥
मारूनि अहंदशकंधर ॥ विजयरूप सर्वदा ॥९२॥
रामविजय मांदुस आळी ॥ आंत होती चाळीस कोहळीं ॥
नररत्‍नद्रव्यें पूर्ण भरली ॥ मज दिधली ब्रह्मानंदें ॥९३॥
पळालें भवदुःखदरिद्र ॥ भाग्य घरा आलें अपार ॥
कीं ग्रंथ हा पंढरीनगर ॥ दृष्टांत अपार यात्रा तेथें ॥९४॥
रामविजय रत्‍नखाणी ॥ वर्णितां धन्य जाहली वाणी ॥
ब्रह्मानंदकृपेकरूनीं ॥ ग्रंथ सिद्धीस पावविला ॥९५॥
आनंदसांप्रदाय पूर्ण ॥ वाढत आले मुळींचे ज्ञान ॥
सृष्टीचे आदिकाळी कमलासन ॥ उपदेशिला नारायणें ॥९६॥
पद्मोद्‌भवें तेंचि ज्ञान ॥ अत्रीस दिधलें संपूर्ण ॥
त्याचे पोटीं आदिपुरुष जाण ॥ दत्तात्रेय अवतरला ॥९७॥
दत्तात्रेयें ज्ञान शुद्ध ॥ सांगूनि बोधिला सदानंद ॥
तेथूनि रामानंद प्रसिद्ध ॥ यतीश्वर अगाध पैं ॥९८॥
तेथोनि मंगलानंद ईश्वर ॥ गंभीर ज्ञानानंद दिवाकर ॥
सहजानंद योगेश्वर ॥ कल्याणधामवासी जो ॥९९॥
तेथूनि पूर्णानंद महायतिराज ॥ जो तपोज्ञानें तेजःपुंज ॥
तेथोनि दत्तानंद यति सहज ॥ पूर्ण दत्तात्रेय अवतार ॥२००॥
त्या दत्तात्रेयाचे उदरीं शुद्ध ॥ पूर्ण अवतरला ब्रह्मानंद ॥
पिता आणि गुरु प्रसिद्ध ॥ तोचि माझा जाणिजे ॥१॥
पंढरीहूनि चार योजनें दूरीं ॥ नैऋत्यकोनीं नाझरें नगरी ॥
तेथील देशलेखक निर्धारी ॥ ब्रह्मानंद पूर्वाश्रमीं ॥२॥
मग पंढरीस येऊन ॥ विधीनें केलें संन्यासग्रहण ॥
भीमातीरीं समाधिस्थ पूर्ण ॥ ब्रह्मानंद यतिराव ॥३॥
तों ब्रह्मानंद पूर्ण पिता ॥ सावित्री नामें माझी माता ॥
श्रीधरें वंदोनियां उभयतां ॥ रामविजय ग्रंथ संपविला ॥४॥
शके सोळाशे पंचवीस ॥ सुभानु नाम संवत्सरास ॥
भानुसप्तमी शुद्ध विशेष ॥ श्रावणमास विख्यात पैं ॥५॥
पंढीरीक्षेत्रीं निश्चयेंसीं ॥ ग्रंथ संपविला ते दिवशीं ॥
लेखक आणि श्रोतयांसी ॥ कल्याण असो सर्वदा ॥६॥
सुभानु संवत्सर भानुवार ॥ भानुवंशीं जन्मला रघुवीर ॥
भानु आणि रोहिणीवर ॥ तोंवरी ग्रंथ असो हा ॥७॥
ब्रह्मानंद पांडुरंगा ॥ श्रीधरवरदा पूर्ण अभंगा ॥
पुराणपुरुषा भक्तभवभंगा ॥ श्रोता वक्ता तूंचि पैं ॥८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत पंडित चतुर ॥ चत्वारिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२०८॥
उत्तरकाण्ड समाप्त ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af-21-%e0%a4%a4%e0%a5%87-40/feed/ 0
श्रीरामविजय अध्याय 1 ते 20 https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af/#respond Mon, 22 Jan 2024 05:02:46 +0000 https://www.sadguruvani.in/?p=682

श्रीरामविजयअध्याय ला

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ ॐ नमोजी पुराणपुरुषा ॥

श्रीमद्भीमातटविलासा ॥ दिगंबरा अविनाशा ॥ ब्रह्मानंदा जगद्रुरो ॥१॥

जय जय जदद्वंद्या पूर्णब्रह्मा ॥ अजअजित आत्मयारामा ॥ नीलग्रीवहृदयविश्रामा ॥ पूर्णनंदा परात्परा ॥२॥

जयजय मायाचक्रचालका ॥ मायातीता विरिंचिजनका ॥ सकळचित्तरीक्षका ॥ निजजनरक्षका करुणाब्धे ॥३॥कमलोद्भव वैकुंठ कर्पूरगौर ॥ अंबिका गजवदन दिनकर ॥ हीं स्वरूपें तुझी साचार ॥ तूं निर्विकार सर्वदा ४॥

मंगळकारक तूं गजवदन ॥ मंगळारंभीं तुझेंचि नमन ॥ मंगळजननीवरी करितां लेखन ॥ तुझे गुण न सरत ॥५॥

रातोत्पलें सकुमार बहुत ॥ तैसे चरतळवे आरक्त ॥ प्रपद गौर नेपुरांसहित ॥ ध्याती भक्त हृदयांतरीं ॥६

क्षीरावर्णवश्र्वेतांबर ॥ कीं कांसेसी लागला क्षीरसागर ॥ कीं निर्दोष यश पवित्र ॥ वसनरूपें आकारलें ॥७

अरुणसंध्यारागामिश्रित ॥ तैसी उटी दिसे आरक्त ॥ कीं मंदराचळ सिंदूर चर्चित ॥ चारी हस्त विराती ॥८॥

भक्तांचा मनोवारण अनिवार ॥ नावरेचि कदा साचार ॥ तो आकर्षावया निर्धार ॥ विवेकांकुश धरियेला ॥९॥

भावें जे शरण येती अज्ञानजन ॥ त्यांचें छेदावया अविद्याविपिन ॥ यालागीं ऊर्ध्व फरश धरून ॥ सिद्ध गजानन सर्वदा ॥१०॥

हातीं झळके लीलाकमळ ॥ जें अम्लान न विटे सर्वकाळ ॥ तेणें पुजूं इच्छी भक्त प्रेमळ ॥ जे कां निर्मळ अंतर्बाह्य ॥११

जैसे कल्पांतविजूचे उमाळे ॥ तैसे अलंकार अंगीं मिरवले ॥ नक्षत्रपुंज गुणीं ओंविले ॥ तेवीं मुक्ताहार डोलती ॥१२

हृदयकाशीं सुरेख ॥ पदक झाला तो मृगांक ॥ क्षयरहित निष्कलंक ॥ निजसुखें सुरवाडला ॥१३

भक्तांसी विघ्ने येती प्रचंडें ॥ तीं जो आकळी शुंडादंडें ॥ कल्पांत विजूचेनि पाडें ॥ एकदंत झकतसे ॥१४॥

दिगंतचक्रीं तेज न समाय ॥ तैसीं कुंडलें झळकती मणिमय ॥ किंवा चंद्र आणि सूर्य ॥ कुंडलरूपें तळपत ॥१५॥

मुगुटीं झळकती रत्नकळा ॥ तेणें नभमंडप उजळला ॥ आदिपुरुष हा साकारलां ॥ वरदान द्यावया कवीतें ॥१६

ऐसा महाराज गजवदन ॥ वरदहस्तें दावी चिन्ह ॥ करी रामकथाबीजारोपण ॥ त्यासी जीवन घालीन मी ॥१७

ऐसा उगवतां वरदचंद्र ॥ तेणें उल्हासे कविहृदयसमुद्र ॥ साहित्यभरतें अपार ॥ असंभाव्य दाटलें ॥१८

जयजय गजवदना निरुपमा ॥ अगाध न वर्णवे तव महिमा ॥ तुझिया गुणांची पाववया सीमा ॥ कैसा सरता होईन मी ॥१९॥

काखेंसी मेरू घेऊनि देखा ॥ कैसी नृत्य करील पिपीलिका ॥ कैसे ब्रह्मांड उचलेल मशका ॥ भृगोळ मक्षिका केविं हलवी ॥२०॥

चंद्रासी कर्पूराचें उटणें ॥ वासरमणीस दर्पण दावणें ॥ हिमनगासी वारा घालणें ॥ मेघासी अर्पणें उदकांजुळी ॥२१॥

सुरतरूपुढें ठेविजे बदरीफळ ॥ मलयाचळासी धूपपरिमळ ॥ कामधेनूसी शुष्कतृणकवळ ॥ आणोनियां समर्पिलें ॥२२॥

क्षीरसिंधूसी समर्पिजे अजाक्षीर ॥ कनकाद्रीपुढें ठेविजे गार ॥ तैसें प्राकृतबोलें अपार ॥ तुझें महत्त्व केविं वर्णंू ॥२३॥

परी जो जो छंद घेत बाळक ॥ तो स्नेहेंकरोनी पुरवी जनक ॥ तरी हा रामविजय सुरेख ॥ सिद्धि पावो तव कृपें ॥२॥

आतां नमूं सरसिजोद्भवकुमारी ॥ जे विलसे सदा कविजिह्णाग्रीं ॥ जिच्या प्रसादें मुकाही करी ॥ वाचस्पतीसीं संवाद २५॥

जे आनंदसरोवरमराळिका ॥ जे चातुर्यचंपककळिका ॥ जे निजकृपेची करूनि नौका ॥ कविबाळका परतीरा नेत ॥२६

कृपें तुझ्या विरिंचिकुमारी ॥ जन्मांध होती महाजोहरी ॥ अतिमूढ तो वेदार्थ करी ॥ शक्रपदीं निर्धारीं रंक बैसे ॥२॥

अंबे तूं कविहृदयाब्जभ्रमरी ॥ कीं निजानंदसागरींची लहरी ॥ वाग्वल्ली तूं बैसोनि जिह्णाग्रीं ॥ विरूढें सफळ सर्वदा ॥२८॥

विवेकहंस शुद्ध धवळ ॥ त्यावरी तुझें आसन अचळ ॥ तप्त कांचन जैसें सुढाळ ॥ तैसें निर्मळ निजांग तुझें ॥२९

शुभ्र कंचुकी शुभ्र अंबर ॥ दिव्य मुक्तनग अळंकार ॥ निजबोधवीणा घेऊन सुस्वर ॥ गायन करिसी स्वानंदें ॥३॥

ऐकतां शारदेचें गायन ॥ तन्मय विधि विष्णु ईशान ॥ अंबे तुझें सौंदर्य पाहोन ॥ मीनकेतन तटस्थ ॥३१

रंभा ऊर्वशी तिलोत्तमा ॥ सावित्री अपर्णा मुख्य रमा ॥ तुझ्या चातुर्यसमुद्राची सीमा ॥ त्याही कदा न पवती ॥३२॥

अंबे तुझे गुण केविं वर्णावे ॥ केविं अर्कास अर्कीसुमनें पूजावें ॥ अंबर मुष्टींत केविं सांठवे ॥ पल्लवीं बांधवे वायु कसा ॥३३॥

न करवे उर्वीचें वजन ॥ न गणवे सिंधूचें जीवन ॥ सप्तावरणें भेदोन ॥ मशक केविं जाऊं शके ॥३४॥

ऐकोनि बाळकाचीं वचनें ॥ जननी हृदयीं धरी प्रीतीनें ॥ तैसें सरस्वतीनें निजकृपेनें ॥ घातलें ठाणें जिह्णाग्रीं ॥३५॥

माझें मन मूढ चकोर ॥ कुहूमाजी इच्छी रोहिणीवर ॥ तरी सरस्वती कृपाळु थोर ॥ शुद्ध बीज प्रकटली ॥३६॥

बीजेपासून चढत्या कळा ॥ तों तों चकोरांसी अधिक सोहळा ॥ तैसी येथें रघुनाथलीळा ॥ चढेल आगळा रस पुढें ॥३७॥

ज्ञानाचे अनंत डोळे ॥ उघडिले एकेचि वेळे ॥ आतां वंदू श्रीगुरूचीं पाऊलें ॥ जयाचेनि प्रगटलें दिव्य ज्ञान ॥३८॥

जो अज्ञानतिमिरच्छेदक ॥ जो प्रकट वेदांतज्ञानार्क ॥ तो ब्रह्मानंदमहाराज देख ॥ परमाद्भुत महिमा जयाचा ॥३९॥

जो कां पांडुरंगभक्त नर विख्यात ॥ जो भक्त भीमातीरीं समाधिस्थ ॥ तो यतिराजमहिमा अद्भुत ॥ कवण वर्णूं शके पैं ॥४०॥

जागृती स्वप्न सुषुप्ति तुर्या पूर्ण ॥ या चार अवस्थांवरी ज्याचें आसन ॥ उन्मनीही निरसोन ॥ स्वसुखें पूर्ण समाधिस्थ ॥४१॥

चांदिणें कैचें नसतां मृगांक ॥ किरणें कैचीं नुगवतां अर्क ॥ जीवनावांचोनि बीजीं देख ॥ अंकुर सहसा फुटेना ॥४२॥

जरी नेत्रेंवीण जरी निवडे नवनीत ॥ तरी सद्भुरूवांचोनि परमार्थ ॥ ठायीं न पडे जीवासी ॥४३

वर नसतां व्यर्थ वऱ्हाड ॥ शिर नसतां कायसें धड ॥ तैसें गुरुकृपेंवीण कबाड ॥ तपें व्रतें सधनें ॥४४॥

अजनेंवीण न सांपडे निधान ॥ गायत्रीवीण ब्राह्मणपण ॥ सीमा कैंची ग्रामावीण ॥ तैसें गुरूवीण ज्ञा नोहे ॥४५॥

म्हणोनि तनमनधनेंसी अनन्य ॥ ब्रह्मानंदस्वामीस शरण ॥ आरंभिली श्रीरामकथा गहन ॥ ग्रंथ संपूर्ण सिद्धी पवो ॥४६॥

ऐसें ऐकतां सप्रेम बोल ॥ बोलिला श्रीगुरू दयाळ ॥ चकोराकारणें उतावेळ ॥ मृगांक जैसा उगवे पैं ॥४७

कीं चातकालागीं धांवे जलधर ॥ कीं क्षुधितापुढें क्षीरसागर ॥ कीं कल्पतरू शोधीत आला घर ॥ दरिद्रयाचें साक्षेपें ॥४८॥

तैसा श्रीगुरु दयासागर ॥ तेणें दिधला अभयवर ॥ म्हणे सिद्धि पावेल साचार ॥ रामविजय ग्रंथ हा ॥४९

आतां वंदूं संतसज्जन ॥ जे वैराग्यवनीचें पंचानन ॥ कीं ज्ञानांबरींचे चंडकिरण ॥ उदय अस्त नसे जया ॥५०॥

जे भक्तसरोवरीचें राजहंस ॥ जे कां अविद्यारण्यहुताश ॥ कीं ते पद्महस्ती विशेष ॥ भवरोगा वैद्य होती ॥५१॥

कीं जीव पावे आपले पदासी ॥ ऐसा मुहूर्त देणार ते ज्योतिषि ॥ कीं ते पंचाक्षरी स्वप्रतापेंसीं ॥ पंचभूतांसी पळविती ॥५२॥

कीं ते दैवीसंपत्तीनें भाग्यवंत ॥ मुमुक्षूंसी करिती दरिद्ररहित ॥ कीं ते दयेचीं अद्भुत ॥ गोपुरें काय उंचावलीं ॥५३

संत श्रोते चतुर पंडित ॥ माझें बोलणें आरुष अत्यंत ॥ जैसा सरस्वतीपुढें मूढ बहुत ॥ वाग्विलास दावीतसे ॥५॥

सूर्यापुढे जैसा दीप देख ॥ कीं जान्हवीस न्हाणावया थिल्लरोदक ॥ कीं कनकाद्री जो अति सुरेख ॥ त्यासी अलकार पितळेचे ॥५५॥कामधेनूस अर्पिलें अजाक्षीर ॥ चंद्रासी शीतळ करी रंभापुत्र ॥ कल्पतरु कल्पिलें देणार ॥ त्यासी निंबोळ्या समर्पिल्या ॥५६रत्नाकरापुढें कांच समर्पिली ॥ तैसी माझी हे आरुष बोली ॥ परी तुम्ही प्रीति बहु ठेविली ॥ प्राकृत शब्दीं नवल हें ॥५७विष्णुसी भूषणें अपार ॥ परी तुळसीवरी आवडी थोर ॥ कीं पार्वतीपतीस बिल्वपत्र ॥ भक्तीं वाहतां आवडे ॥५८रायें दासीस पाठीं घालितां । तिची सर्वांवरी चाले सत्ता ॥ थोड्या मोलाचे अळंकार लेतां ॥ जनसमस्तां थोरदिसे ॥५९॥म्हणोनि तुम्ही संत प्रभु थोर ॥ तुमचा महिमा न वर्णवे अपार ॥ मोटेंत बांधवेल समीर ॥ चरणीं अंबर क्रमवेल पैं ॥०॥गणवतील पृथ्वीचे रजःकण ॥ मोजवेल सिंधूचें जीवन ॥ कनकाद्रीचा चेंडू करून ॥ उडविजेल सर्वथा ॥६१भोगींद्रमस्तकींचा मणी ॥ आणवेल एखादे क्षणीं ॥ सूर्य जातां धरवेल गगनीं ॥ नक्षत्रें गुणीं ओंविजेतील॥६२॥

काढवेल शशिमंडळीचें अमृत ॥ मोडवतील ऐरावतीचे दांत ॥ कीं दिग्गज आणोन समस्त ॥ एके ठायीं बांधजेतील ॥६३॥

तुरंग करूनि प्रभंजन ॥ करवेल सर्वत्र गमन ॥ परी न कळे संतांचें महिमान ॥ जे ब्रह्मानंदें पूर्ण सदा ॥६४

तों संत बोलती आनंदघन ॥ मन निवालें तव बोल ऐकून ॥ आम्ही करूं इच्छितों रामकथा श्रवण ॥ वरी दष्टांत गोड तुझे ॥६५॥मेरू सुंदर रत्नेंकरून ॥ कीं नक्षत्रें मंडित गगन ॥ कीं वृक्ष फळीं परिपूर्ण ॥ तैसा दृष्टांतें ग्रंथ शोभे ॥६६

कीं शांति क्षमा दया विशेष ॥ तेणें मंडित सत्पुरुष ॥ कीं परिवारासहित नरेश ॥ दृष्टांत सुरस ग्रंथीं तैसे ॥६७॥

आधींच भूक लागली बहुत ॥ त्याहीवरी वाढिलें पंचामृत ॥ कीं दुर्बळासी अकस्मात ॥ कल्पतरु भेटला ॥६८॥

कन्यार्थी हिंडतां भूमंडळ ॥ त्यासी राजकन्या घाली माळ ॥ कीं रोगीयासी रसायन निर्मळ ॥ अकस्मात जोलें ॥६९॥

आतां बहु टाकोनि शब्दजाळ ॥ बोलें रामकथा रसाळ ॥ जैसी सिकता सांडोनि मराळ ॥ मुक्ताफळेंचि सेविती ॥७०

कीं कोशगृहीं प्रवेशोनी ॥ भांडारी रत्नें काढी निवडोनि ॥ कीं दोष टाकून सज्जनीं ॥ उत्तम गुण स्वीकारिजे ॥७१

ऐसे संतांचें बोल परिकर ॥ ऐकोनी ब्रह्मानंदें श्रीधर ॥ साष्टांग घालोनि नमस्कार ॥ म्हणे सादर परिसिजे ॥७२

असंभाव्य श्रीरामचरित्र ॥ शतकोटि ग्रंथ सविस्तर ॥ वाल्मीक बोलिला अपार ॥ कथासमुद्र अगम्य ॥७३

जो सत्यवतीहृदयरत्न ॥ कथी जगद्रुरु पराशरनंदन ॥ तें व्यासोक्त रामायण ॥ कोणा संपूर्ण न वर्णवे ७४॥

वसिष्ठें कथिलें निश्र्चितीं ॥ तें वासिष्ठरामायण म्हणती ॥ शुकें कथिलें नानारीतीं ॥ शुकरामायण बोलतीतया ॥७५॥

जो अंजनीहृदयारविंदभ्रमर ॥ तेणें पाहोन श्रीरामचरित्र ॥ कथिलें नाटकरामायण साचार ॥ अपार चरित्र निजमुखें ॥६॥

जो परम विश्र्वासें श्रीरामासी शरण ॥ शक्रारिजनकबंधु बिभीषण ॥ तेणें रामचरित्र कथिलें पूर्ण ॥ बिभीषणरामायण म्णती तया ॥७७॥कमलोद्भव विष्णुसुत ॥ तेणें नारदासी कथिलें हें चरित्र ॥ तें ब्रह्मरामायण अद्भुत ॥ उमेसी सांगत शिव रामायण ॥७८जो कलशोद्भव महामुनी ॥ जेणें जलधि आटिला आचमनेंकरूनी ॥ तेणें रामकथा ठेविली विस्तारोनी ॥ अगस्तिरामाण म्हणती तया ॥७९॥भोगींद्र कथी सर्पांप्रती ॥ तें शेषरामायण बोलिजे पंडितीं ॥ अध्यात्मरामायण समस्तीं ॥ ऋषींनीं निवडून काढिलें ॥८०एक शेषरामायण सत्य ॥ आगमरामायण एक बोलित ॥ कूर्मरामायण यथार्थ ॥ कूर्मपुराणीं बोलिलें ॥८१॥स्कंदरामायण अपार ॥ एक पौलस्तिरामायण परिकर ॥ कालिकाखंडीं सविस्तर ॥ रामकथा कथियेली ॥८२॥रविअरुणसंवाद ॥ ते अरुणरामायण प्रसिद्ध ॥ पद्मपुराणीं अगाध ॥ पद्मरामायण कथियेलें ॥८३

भरतरामायण चांगलें ॥ एक धर्मरामायण बोलिलें ॥ आश्र्चर्यरामायण कथिलें ॥ बकदाल्भ्यऋषीप्रती ॥८४॥

मुळापासून इतक्या कथा ॥ कैशा वर्णवतील तत्त्वतां ॥ त्यांमाजीं वाल्मीकनाटकाधारें कथा ॥ रामविजयलागीं कथूं ॥८५॥

समस्त कवींस नमस्कार ॥ जो जगद्रुरु आचार्य श्रीशंकर ॥ जेणें मतें उच्छेदोन समग्र ॥ शुद्ध मार्ग वाढविला ॥८६

पूर्वी एक सत्यवतीकुमर ॥ तैसाचि कलियुगीं श्रीशंकर ॥ जो ज्ञानाचा सागर ॥ जनदुद्धार केला जेणें ॥८७

सकळ मतें उच्छेदून ॥ सन्मार्ग वाढविला पूर्ण ॥ सकळ मतवादी जंबुक जाण ॥ शंकरसिंह गर्जतसे ॥८॥

सकळ मतवादी दरिद्री ॥ शंकर श्रीमंत पृथ्वीवरी ॥ संन्यासदीक्षा निर्धारीं ॥ स्थापिली जेणें विधियुक्त ८९॥

अवघे मतवादी रजनीचर ॥ शंकर त्यांवरी रघुवीर ॥ कीं कौरव वधावया यादवेंद्र ॥ अति उदित साक्षेपें ॥९॥

तैसा श्रीशंकराचार्य सकळ ॥ कुमतें छेदी तात्काळ ॥ त्या आचार्याचें पदकमळ ॥ श्रीधरभ्रमरें वंदिलें ॥९१

जो श्रीधराचार्य टीककारा ॥ त्यासी नमस्कारी श्रीधर ॥ मधुसूदनादिक कवींद्र ॥ ग्रंथ अपार जयांचे ॥९२

जो श्रृंगारवनींचा विहंगम जाण ॥ जो जयदेव पद्मावतीरमण ॥ त्याची काव्यकला पाहून ॥ पंडितजन तस्थ ॥९३॥

जो वेदांतक्षीरार्णवींचा मीन ॥ जेणें विवेकसिंधु रचिला पूर्ण ॥ तो मुकुंदराज गुणनिधान ॥ तयाचे चरण वंदिले ९४॥

तारावया जन समग्र ॥ पुनः अवतरला रमावर ॥ गीतार्थ केला साचार ॥ तो ज्ञानेश्र्वर जगद्गुरु ॥९५

जो भानुदासकुळभूषण ॥ प्रतिष्ठानवासी परिपूर्ण ॥ त्या एकनाथें ग्रंथसंपूर्ण ॥ बहुसाल कथियेले ॥९६॥

जे चातुर्यजानधानीचे कळस ॥ मुक्तेश्र्वर मुद्रलदास ॥ ज्यांचे ग्रंथ पाहतां सुरस ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥९७॥

जैसा चंडांशु सतेज व्योमीं ॥ तैसाचि केवळ वामनस्वामी ॥ ज्याची श्र्लोकरचना या भूमि-॥ मंडळीवरी अपर्व ॥९८॥

कृष्णदास जयराम ॥ जो शांतिदयेचें निजधाम ॥ ज्याचे ग्रंथ ज्ञानभरित परम ॥ जो निस्मीम ब्रह्मचारी ॥९९

श्रीरामउपासक निर्मळ ॥ जो भजनसरोवरींचा मराळ ॥ तो रामदासमहाराज केवळ ॥ भक्ति प्रबळ लावी जना ॥१००॥

ब्रह्मानंदस्वामीचा बंधु सत्य ॥ नाम तयाचें श्रीरंगनाथ ॥ ज्याची कविता ऐकतां समस्त ॥ अपार जन उद्धरले ॥१॥

आतां असोत समस्त कविवर ॥ अवघे ब्रह्मानंदरूप साचार ॥ त्यांसी अनन्य शरण श्रीधर ॥ द्यावा वर ग्रंथासी ॥२॥

रविकुळीं अवतरोनि श्रीरघुवीर ॥ कैसें केलें लीलाचरित्र ॥ धन्य त्या वाल्मीकाचें वक्र ॥ कथा अपार बोलिला ॥३

हें वर्णितां श्रीरामचरित्र ॥ तरला वाल्मीक साचार ॥ पापें आचरला अपार ॥ ऐका सादर गोष्टी ते ॥४

वाल्मीक पूर्वीं द्विजसुत ॥ त्यजोनि आचार यज्ञोपवीत ॥ किरातसंगें वाट पाडित ॥ अति उन्मत्त वषयांध ॥५॥

महा दुर्धर कानन ॥ देखतां भयभीत होय मन ॥ पर्वतदरीमाजीं स्थळ करून ॥ सहपरिवारें वसे तेथें ॥६

भोंवतें द्वादश गांवेंपर्यंत ॥ पाळती राखोनि वाट पाडित ॥ केल्या ब्रह्महत्त्या असंख्यात ॥ नाहीं गणि इतर जीवां ॥७॥

मत्स्य धरावयालागीं बक ॥ बैसे होऊनियां सात्विक ॥ कीं मृषकालागीं बिडालक ॥ बैसे टपत जयापरी ॥८॥

कीं अंगसंकोचें पारधी ॥ जपोनि तत्काळ मृग साधी ॥ तैसा वाल्हा जीव वधी ॥ पापनिधि निर्दय ॥९॥

अपार जीव मारिले ॥ पापाचे पर्वत सांचले ॥ जैसे अंत्यजगृहाभोंवते पडिले ॥ ढीग बहुत अस्थींचे ॥११०॥

ऐसें करितां पापाचरण ॥ तयासी आलें वृद्धपण ॥ पुत्र झाले अति तरुण ॥ तरी अंगवण न सोडी ॥११॥

शस्त्र हातीं घेऊनि वाल्हा ॥ मार्ग रक्षीत जों बैसला ॥ तों अकस्मात नारद प्रगटला ॥ पूर्वपुण्येंकरूनिया ॥१२॥

चंद्रा वेष्टित नक्षत्रें जैसीं ॥ भोंवतीं ऋषींची मांदी तैसी ॥ तों पाळती सांगती वाल्हियासी ॥ जाती तापसी बहसाल ॥१३॥

वाटेसी धांवोन आडवा आला ॥ शस्त्र उभारोनी तें वेळां ॥ दटावोनि ऋषींचा मेळा ॥ उभा केला क्षणभर ॥१४

कीं स्वर्गपंथें जातां नेटें ॥ जैसी यमपुरी लागे वाटे ॥ कीं तपें आचरतां उद्भटें ॥ कामक्रोध अडविती ॥१५

असो वाल्हा म्हणे तयांसी ॥ मात्रा आणारे मजपासीं ॥ नाहीं तरी मुकाल प्राणासी ॥ माझिया हस्तें याकाळीं ॥१६॥

मग पुढें होऊन ब्रह्मनंदन ॥ म्हणे ऐक एक आमुचे वचन ॥ तुज आलें वृद्धपण ॥ पापें अपार घडलीं कीं ॥१७

द्रव्य जोडिलें त्वां अपार ॥ झाले दृष्कृतांचे संभार ॥ तुझे पापासी वांटेकर ॥ कोण आहेत हे विचारीं ॥१८॥

तुझें आलें जवळी मरण ॥ यम जेव्हां गांजील दारुण ॥ तेव्हां तुजला सोडवील कोण ॥ पाहें विचारून अंरीं ॥१९॥

दारा पुत्र धन यौवन ॥ बंधु सेवक आप्त स्वजन ॥ शस्त्रें अस्त्रें चतुरंग सैन्य ॥ न ये कामा ते वेळे ॥१२०

जीं जीं प्राणी कर्में करिती ॥ तितुकीं देव सर्व विलोकिती ॥ सकळ तत्त्वें व्यापून वर्तती ॥ मग साक्ष देती परत्रीं ते ॥२१॥

यमपुरीस चित्रगुप्त ॥ पत्रें काढुनि वाचित ॥ मग त्यासारिखा दंड करीत ॥ कोण तेथें सोडवील ॥२२॥

जो पुण्यपंथें न चाले नर ॥ निंदी तीर्थयात्रा समग्र ॥ त्यासी ताम्रभूमि तप्त अपार ॥ तीवरी चालवित हळूहळू ॥२३॥

जो परोपकार न करिती ॥ त्यांसी असिपत्रावरि हिंडविती ॥ इकडून तिकडे शस्त्रें टोंचती ॥ कोण सोडवील ते स्थानीं ॥२४॥

तप्त लोहाचा स्तंभ दारुण ॥ त्यासी भेटविती नेऊन ॥ देवद्विजां जो न करी नमन ॥ त्यासी जाण हीच गती ॥२५

जो संतांसी देखों न शके अपवित्र ॥ त्याचे रागें गीध फोडिती नेत्र ॥ जो कीर्तन स्मरण न करी अणुमात्र ॥ जिह्णा तोडिती सांडसें ॥२६॥

गुरु देवब्राह्मण सांडूनी ॥ जो षड्रस सेवी पापखाणी ॥ महानरकींचें दुर्गंध पाणी ॥ तयाचे वदनीं ओतिती ॥२७

जो तीर्थस्नान निंदी खळ ॥ त्यासी तप्त कढयीमाजीं जें तैल ॥ त्यांत तळिती तत्काळ ॥ कोण सोडवील तथें पैं ॥२८॥

जे साधुसंतासि पीडिती ॥ त्यांचे अंगाची सालें काढिती ॥ जे गुरु द्विज तीर्थें अव्हेरिती ॥ त्यांचे तोंडीं घालिती नरकमूत् ॥२९॥

धर्मवाट रोधून हरिती जे धन ॥ त्यांसी कुंभीपाकीं घालून ॥ खालीं चेतविती कृशान ॥ माजीं आक्रंदोनि चडफडती ॥१३०

लोहदंड करूनि तप्त ॥ कानीं खोंविती यमदूत ॥ जो नायके हरिकथामृत ॥ गति निश्र्चित त्यास ही ॥३१

ऐसें बोलतां नारदऋृषी ॥ अनुताप जाहला त्याचे मानसीं ॥ वेगें आला निजसदनासी ॥ स्त्रीसुतांदिकांसीं पसत ॥३२॥

पापें घडलीं मजलागीं ॥ कोणी होतां काय विभागी ॥ तंव ते म्हणती आमुचे अंगीं ॥ न लागती पापें सर्वथा हीं ॥३॥

आम्ही भाग्याचे वांटेकरी यथार्थ ॥ पापें तुझीं तूं भोगी समस्त ॥ वाल्हा झाला सद्रदित ॥ म्हणे कैसें आतां करावें ३४॥

हा नरदेह उत्तम पूर्ण ॥ केवळ भगवत्प्राप्तीचें कारण ॥ म्यां आत्महित न करून ॥ बुडालों कीं अंधतमीं ॥३५

पुण्यक्षेत्र सरसाविलें ॥ तेथें कनकबीज पेरिलें ॥ कनकाचें ताट घडिलें ॥ त्यांत वाढिलें तृणबीज ॥३६

सुधारसकुंभ दैवें जोडला ॥ तो नेऊन उकिरडां ओतिला ॥ चिंतामणि फोडून घातला ॥ पायरीस अभ्यग्यें ॥३७॥

सुरभी शोधीत आली घर ॥ तिसी मारूनि काष्ठप्रहार ॥ अभ्याग्यें घातली बाहेर ॥ तोच प्रकार मज जाहला ॥३८॥

बळें कल्पवृक्ष तोडून ॥ वाढविलें कंटकवन ॥ राजहंस दवडून ॥ दिवाभीत पाळिलें ॥३९

रंभा तोडूनि महामुर्खें ॥ अर्की वाढविल्या सकौतुकें ॥ वोसंडोनि सतेज मुक्तें ॥ सिकतहरळ भरियेली ॥१४०॥

असो ऐसा अनुतापें वाल्हा ॥ नारदापासीं परतोन आला ॥ सद्रद कंठ अश्रु डोळां ॥ साष्टांग घातला नमस्कर ॥४१॥

तनुमनधनेंसीं अनन्य ॥ स्वामी तुज मी आलों शरण ॥ तूं कृपेची नौका करून ॥ तारीं मज अघसाागरीं ॥४२

महाराज तूं धन्वंतरी ॥ माझा भवरोग दूर करीं ॥ जळतों या वणव्याभीतरीं ॥ मेघ झडकरी वर्षें तूं ॥४३

पडिलों मायेचे मेळीं ॥ पंचभूतें मज झोंबलीं ॥ वासनाविशवी गळां पडली ॥ कदाकाळीं सोडीना ॥४४

अहंदेहबुद्धि डांकिण ॥ ममता सटवी दारुण ॥ लोभ झोटिंग एक क्षण ॥ मज उमज घेऊं नेदी ॥४५

क्रोध महिषासुर दारुण ॥ कामवेताळें झडपिलें पूर्ण ॥ तृष्णा मायराणी अनुदिन ॥ सर्वदाही न सोड ॥४६॥

जाहलों मी अत्यंत क्षीण ॥ पंचाक्षरी तूं ब्रह्मनंदन ॥ सकळ भूतें टाकीं झाडून ॥ म्हणोनि चरण धरियेल ॥४७॥

अष्टभावें जाहला सद्रदित ॥ मग मनीं विचारी ब्रह्मसुत ॥ रोग पाहुनि वैद्य निश्र्चित ॥ दिव्य मात्रा काढी जवीं ॥४८॥

म्हणे हा अनधिकारी परम ॥ ‘मरा’ ऐसें सांगें नाम ॥ म्हणे हेंचि तूं जपें सप्रेम ॥ मुख्य वर्म जाण पां ॥४९

तें जीवन नाम जपत ॥ तेथेचि बैसला ध्यानस्थ ॥ आंगावरी वारुळ वाढत ॥ ध्वनि उमटत आंतोनी ॥१५०॥

टोणपियाचा वृक्ष जाहला ॥ तों नारद बहुकाळें पातला ॥ त्या तरुवरा खाली उभा राहिला ॥ श्रवणीं ऐकिला नामघोष ॥५१॥

वारुळाचे छिद्रांमधुनी ॥ रामनामाची मधुरध्वनी ॥ चातुर्यसमुद्र नारदमुनी ॥ जाणिलें मनी वृत्त सर्व ॥५२॥

मग उकरोनियां वारुळ ॥ बाहेर काढिला तो पुण्यशीळ ॥ वर्मकळा रगडून तात्काळ ॥ सावध केला तेधवां॥५३॥

जैसा भूमीवरी अर्क उतरला ॥ तैसा श्रीगुरुनारद देखिला ॥ धांवोन चरणकमळा लागला ॥ पापाचा जाहला संहार ॥५४॥

नाम जपतां श्रीरामाचें ॥ दोष गेले अनंत जन्मांचे ॥ जैसे पर्वत तृणाचे ॥ अग्निसंगें भस्म होती ॥५५

पापें जळावया समस्त ॥ नामामाजी प्रताप बहुत ॥ नामाचेनि न जळे निश्र्चित ॥ ऐसें पाप नसेचि ५६॥

वाल्मीकें केली जीं पापें ॥ तीं भस्म जाहलीं नामप्रतापें ॥ नामापुढें अनेक तपें ॥ तुच्छ ऐसें जाणिजे ॥५७॥

जैसा पर्वत होतां संदीप्त ॥ मृगाद्विजगण न राहती तेथ ॥ तैसीं नामाग्नीपुढें समस्त ॥ पापारण्यें भस्म हती ॥५८॥

जैसी स्वप्नीं घडली दुष्कृतें बहुत जागृतीं अवधीं मिथ्याभूत ॥ तैसे रामनामें समस्त ॥ पापसमूह भस्म होती ॥५९॥

तोंवरी तमाची दाटणी ॥ जों नुगवे वासरमणी ॥ तोंवरीच मद कीजे वारणीं ॥ जोंवरी सिंह नाहीं देखिला ॥१६०॥

सिंधु गर्जे तोंवरीच पाहीं ॥ जो कलशोद्भव देखिला नाहीं ॥ तोंवरी भूतांची परम घाई ॥ जों मंत्रवादि न देखिला॥६१॥

तोंवरीच पापांचा संभार ॥ जों नामीं न धरी आदर ॥ नामप्रताप अद्भुत थोर ॥ तरला साचार वाल्मीक ॥६२॥

असो वाल्मीक म्हणे गुरुनाथा ॥ जरी कृपा कराल सर्वथा ॥ तरी रामचरित्रकथा ॥ सविस्तर करीन मी ॥६॥

ऐसें ऐकतां नारदमुनी ॥ परम संतोषला अंतःकरणीं ॥ वरदहस्त ठेवोनियां मूर्ध्नीं ॥ वदला तें श्रवणीं आकर्णिजे ॥६४॥

साठी सहस्त्र वरुषांवरी ॥ विष्णु अवतरेल दशरथउदरीं ॥ तयाचें तूं भविष्य करीं ॥ शतकोटी सविस्तर ॥६५॥

जन्मकर्मलीला सर्व ॥ जे जे तूं वदसील भाव ॥ तैसाच वर्तेल राघव ॥ अवतारठेव अभिनव पैं ॥६६

शतकोटी ग्रंथ वाल्मीकें निर्मिला ॥सुरस रस दिव्य ओतिला ॥ तिहीं लोकांसी कलह लागला ॥ व्यवहार गेला शिवापाशीं ॥६७॥

परम चतुर कैलासनाथ ॥ तीं ठायीं समान वांटिला ग्रंथ ॥ शेवटीं दोन अक्षरें उरलीं यथार्थ ॥ कंठीं धरिली उमावरें ॥६८

शीतळ उपचार पूर्वीं केले ॥ परी ते नाहीं सफळ जाहले ॥ चंद्रबिंब शिरीं धरिलें ॥ जटेंत आकळिलें गंगेसी ॥६९॥

हिमनगकन्या शीतळ सुंदर ॥ अर्धां अर्धांगीं धरी कर्पूरगौर ॥ ठायीं ठायीं वेष्टिले फणिवर ॥ शीतळ थोर म्हणोनियां ॥१७०॥

गजचर्म अत्यंत शीतळ ॥ तेंही पांघरे जाश्र्वनीळ ॥ परी न राहे हळाहळ ॥ जाळी प्रबळ अधिकचि ॥७१

मग हा ग्रंथ निवडितां थोर ॥ दोन अक्षरें निवडिलीं साचार ॥ तीं कंठीं धरितांचि उमावर ॥ शीतळ शरीर जाहलें ॥७२॥

हृदयीं आठविला रघूत्तम ॥ मुखी स्मरतां रामनाम ॥ मध्यें हळाहळ परम ॥ भयभीत जाहलें ॥७३

मुखीं नाम हृदयीं राम ॥ दाहकत्व सांडूनि जाहलें शम ॥ भूषणरूप होऊनि परम ॥ शिवकंठीं मिरवलें ॥७४॥

नामें तरला वाल्मीक ॥ नामे तरले ब्रह्मादिक ॥ शीतळ जाहला कैलासनायक ॥ महिमा अद्भुत न वर्णवे ॥७५॥

किती गोड म्हणावा सुधारस ॥ किती वाड म्हणावें आकाश ॥ तेजस्वी परम चंडांश ॥ किती म्हणोनी वर्णावा॥७६॥

पृथ्वीस उपमा काय द्यावी ॥ पाताळखोली किती सांगावी ॥ कनकाद्रीची उंची किती वर्णावी ॥ तैसी नामाची पदवी अपार ॥७७॥

किती वर्णावा विष्णूचा प्रताप ॥ काय सांगावें शंकराचें तप ॥ तैसा रामनाममहिमा अमूप ॥ न वर्णवेचि सर्वथा ॥७८

प्राकृतभाषा म्हणोनि ॥ अव्हेर न करावा पंडितजनीं ॥ जैसीं कृष्णावेणीचीं तीरें दोन्ही ॥ परी उदक एकचि जाणिजे ॥७९॥

असो वाल्मीकें रचिला ग्रंथ ॥ भारद्वाजाचे मुखें समस्त ॥ असंख्य ऋषि श्रवण करित ब्रह्मानंदें करूनियां ॥१८०॥

हेचि कथा कैलासीं ॥ शिव सांगे हैमवतीसी ॥ पाताळीं काद्रवेयकुळासी ॥ भोगींद्र सांगे हेचि कथा ॥८१

घटोद्भवाचे मुखीं दिवसरजनी ॥ ऋषी श्रवण करिती कर्दळीवनीं ॥ किंपुरुषखडीं स्वमुखेंकरूनी ॥ वानरांसी सांगे हनुमंत ॥८२॥

नारदाप्रती सरसिजोद्भव ॥ सांगे रामकथा अभिनव ॥ बदरिकाश्रमीं ऋषि सर्व ॥ व्यासमुखें ऐकती ॥८३

तेचि प्राकृत भाषेंत निवाडे ॥ श्रीधर वर्णीं संतापुढें ॥ जैसे बाळचाळे वेडेवांकुडे ॥ परी आवडी जननीसी ॥८४॥

तैसें प्राकृत आणि संस्कृत ॥ दोहींमाजी एकचि अर्थ ॥ जैसा दोही स्त्रियांचा एक नाथ ॥ दोन हस्त एकाचेचि ॥८५॥

दोन्ही दाढा एकचि स्वर ॥ पाहणार एक दोन नेत्र ॥ किंवा दोन पात्रांत पवित्र ॥ एकचि दुग्ध घातलें ॥८६

जैसें त्रिवेणीचें भरलें उदक ॥ दोन पात्रीं गोडी एक ॥ एक सुवर्णकूपिका अलोलिक ॥ एक ताम्रधातृची घडियेली ॥८७॥

दोनी कूपिका नेऊनि देख ॥ रामेश्र्वरासी केला अभिषेक ॥ दोन्ही धातु परी उदक एक ॥ देवासी समचि आवडती ॥८८॥

अबळां न कळे संस्कृत वाणी ॥ जैसें आडांतील निर्मळ पाणी ॥ परी दोरपात्रावांचोनी ॥ अशक्त जनां केवीं निघे ॥८९

तों तडागासी येतां त्वरें ॥ तत्काळचि तृषा हरे ॥ आबालजन तारावया ईश्र्वरें ॥ प्राकृत ग्रंथ निर्मिले ॥१९०॥

मुख्य संस्कृत पहावें ॥ परी तें अबळा नेणवे ॥ महागज कैसा बांधवे ॥ कमळतंतू घेऊनियां ॥९१॥

सर्वांस मान्य गीर्वाण ॥ जरी असेल पूर्वपुण्य ॥ तरीच तेथीचें होय ज्ञान ॥ आबालजन केवीं तरत ॥९२॥

उत्तम वस्त्रें लेत नृपती ॥ तीं दुर्बळांसी प्राप्त न होती ॥ मग ते घोंगडीच पांघरती ॥ शीतउष्ण निवारणा ॥९३॥

जैसें दधि मंथितां बहुत ॥ त्यांतून निघे नवनीत ॥ कीं स्वातीजळापासोन अद्भूत ॥ मुक्तफळें निपजती ॥९४॥

कीं इक्षुदंडाचे पोटीं शर्करा ॥ रसनेस गोडी तेचि विचारा ॥ कीं राजापासोन राजपुत्रा ॥ मान्यता होय बहुतचि ॥९५॥

महाराष्ट्रवचनें निश्र्चित ॥ परी अत्यंत रसभरित ॥ मधुमक्षिकांचे मुखीं स्रवत ॥ मधु सुरस जैसे कां ॥९६

गीवार्ण हें शशिमंडळ अद्भुत ॥ त्याची प्रभा ते हे प्राकृत ॥ संस्कृत ग्रंथ वर्णिती पंडित ॥ अर्थ प्राकृत करिती कीं ॥९७॥

अर्कवृक्षीं मधुघट ॥ जरी भरितील यथेष्ट ॥ तरी गिरीकंदरीं करावया कष्ट ॥ काय कारण धांवावें ॥९८॥

सिकतेमाजी दिव्य रत्न ॥ जरी सापडे न करितां प्रयत्न ॥ तरी चतुरीं करावें जनत ॥ किंवा अव्हेर करावा ॥९९॥

कष्टेंविण राज्य आलें हातां ॥ तरी काय ओसांडावें तत्त्वतां ॥ प्राकृतभाषीं ऐकोनी कथा ॥ लाभ श्रोतां घेईजे तेवी ॥२००॥

मुक्तफळांची उत्तम माळा ॥ वरी सुगंध सुटला आगळा ॥ तरी चतुरी का न घालावी गळां ॥ अति आवडी करोनीयां ॥१॥

आधींच इक्षुदंड गोड ॥ वरी आलें साखरेचें घड ॥ तैशी रघुनाथकथा सुरवाड ॥ त्यावरी साहित्य पुरविलें ॥२

आतां श्रोतीं सावधान ॥ वाल्मीकमहाराज गेले कथून ॥ तेचि रामकथा संपूर्ण ॥ मूळापासून ऐकिजे ॥३॥

दृष्टीं न पाहतां अवघा ग्रंथ ॥ उगाच दोष ठेविती अकस्मात ॥ ते शतमूर्ख जाणिजे निश्र्चित ॥ नव्हती पंडित विवेकी ॥४॥

ग्रंथा नाम रामविजय ॥ श्रवणें सदा पाविजे जय ॥ चिंतित मनोरथ सिद्ध होय ॥ एक आवर्तन करितांचि ॥५

आदिपुरुष श्रीअवधूत ॥ तोचि हा ब्रह्मानंद यथार्थ ॥ श्रीधरवरदें अद्भुत ॥ महिमा कोणा न वर्णवे ॥६॥

इति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ समत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ प्रथमाध्याय गोड हा ॥२०७॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु॥

श्रीरामविजयअध्याय रा

श्रीगणेशाय नमः ॥जैसे मानससरोवरवेष्टित ॥ मराळ दिसती शोभिवंत ॥ तैसे श्रवणासी बैसले संत ॥ लोचन अनंत जयांसी ॥१॥श्रवणीं ऐकतां संतसज्जन ॥ वाचेसी पारणें होय पूर्ण ॥ जैसा राकाइंदु विलोकून ॥ सरितानाथ उचंबळे ॥२॥कीं वर्षाकाळीं गंगसी पूर ॥ कीं घन गर्जतां नाचती मयूर ॥ कीं वसत देखोनि सुंदर ॥ कोकिळा गर्जे आनंदें ॥३॥कीं रवि देखतां कमळें विकासती ॥ कीं दाता देखोनि याचक हर्षती ॥ तैशा देखोनि संतमूर्ती ॥ वाग्देवीस आनंद ॥४॥

जैसी इंद्रापुढें रंभा ॥ दावी नृत्यकौतुकशोभा ॥ तैसी देखतां संतसभा वाग्वल्ली आनंदे ॥५॥

कैसे द्यावे दृष्टांत ॥ हें मी नेणें निश्र्चित ॥ परी माझे अन्याय समस्त ॥ संतीं पोटांत घालावे ॥६॥

शिवकंठी हाळाहळ ॥ कीं सागरापोटीं वडवानळ ॥ कीं सृष्टीचा भार सकळ ॥ पाताळीं कूमें धरियेला ॥७॥

सकळां प्रकाशक जैसा शशी परी द्वितीयेसी लोक वाहती दशी ॥ कीं हिमनगजामातासी ॥ धत्तूरपुष्पें समर्पिती ॥८॥

तैसेचि हे शब्द निश्र्चित ॥ सज्जनीं हृदयीं धरिले सत्य ॥ असो प्रथमाध्यायीं गतकथार्थ ॥ उद्धरिला वाल्मीक नारदें ॥९॥

रामकथेचा आरंभ येथूनी ॥ जेवीं मूळसंकीर्ण कृष्णावेणी ॥ परी पुढें विशाळ समुद्रगामिनी ॥ जाणिजे सज्जनीं कथा तैसी ॥१०॥

कमलोद्भवापासून निश्र्चितीं ॥ पुत्र जाहला त्या नाम पुलस्ती ॥ महातपस्वी जैसा गभस्ती ॥ चारी वेद ज्यासी मुखाद्रत ॥११॥

तृणबिंदुकन्या देववर्णीं ॥ ते पुलस्तीची जाण गृहिणी ॥ विश्रवा नामें तिजपासोनि ॥ पुत्र जाहला विख्यात ॥१२॥

भारद्वाजकन्या महासती ॥ ती दिधली विश्रव्याप्रति ॥ त्यांचे पोटीं निश्र्चिती ॥ कुबेर पुत्र जन्मला ॥१३॥

विश्रव्यापासोनि जन्म पूर्ण ॥ म्हणोनि नाम वैश्रवण ॥ तेणें तप करोनि दारुण ॥ चतुरानन वश केला ॥१४॥

कमळासन संतुष्टोन ॥ पौत्रपुत्र म्हणोन ॥ लंका पुष्पक देऊन ॥ सागरोदरीं स्थापिला ॥१५॥

पूर्वीं विधीनें लंका निर्मिली ॥ ती दानवीं बळेंचि घेतली ॥ मागुती निर्जरीं सोडविली ॥ मग दिधली कुबेरातें ॥१६॥

तो पाताळींचा दैत्य सुमाळी ॥ विप्रवेषें आला भूमंडळीं ॥ लंका देखोन तये वेळीं ॥ मनामाजी आवेशाला ॥१७॥

म्हणे हे लंका आमुची निश्र्चित ॥ हा कोण येथें राज्य करित ॥ समाचार घेतां जाहलें श्रुत ॥ सर्व वृत्त तयाचें ॥१८॥

कुबेर देखोनि सुंदर ॥ दैत्य करी मग विचार ॥ याचे पित्यासी साचार ॥ कन्या देऊं आपुली ॥१९॥

तिजपासोन जे होती सुत ॥ तयां साह्य होऊं सर्व दैत्य ॥ हें लंकाराज्य समस्त ॥ हिरोन घेऊं क्षणार्धें ॥२०॥

ऐसा सुमाळी दैत्य दुर्जन ॥ विप्रवेष अवलंबून ॥ आला लटिकीच शांति धरून ॥ कपटी पूर्ण दुरात्मा ॥२१॥

जैसा नटाचा वेष जाण ॥ कीं विषाचें शीतळपण ॥ कीं सावचोराचें गोड वचन ॥ परप्राणहरणार्थ ॥२२॥

कीं गोरियाचें गायन ॥ कीं दांभिकाचें वरिवरी भजन ॥ धनलुब्धाचें तत्त्वज्ञान ॥ परधनहरणार्थ ॥२३॥

वरिवरी सुंदर इंद्रावण ॥ किंवा बकाची शांति पूर्ण ॥ कीं वेश्येचें मुखमंडण ॥ कामिकमनहरणार्थ ॥२४॥

कीं साधुवेष धरोनि शुद्ध ॥ यात्रेसी फिरती जैसे मैंद ॥ कीं वाटपाडे निरंजनीं शुद्ध ॥ सिद्ध होऊन बैसले ॥२५॥

असो ऐसा सुमाळी पापराशी ॥ तेणें आपुली कन्या कैकसी ॥ घेऊन आला विश्रव्यापाशीं ॥ प्रार्थोनि त्यासी दिधली ॥२६॥

म्हणे मी अकिंचन ब्राह्मण ॥ एवढें घ्या जी कन्यारत्न ॥ ऋृषीनें कापट्य नेणोन ॥ लाविलें लग्न तियेसीं ॥२७॥

दैत्य गेला स्वस्थानासी ॥ एके दिवशीं ते कैकसी ॥ सूर्य जातां अस्ताचळासी ॥ भोग पतीसी मागत ॥२८॥

जे संध्याकाळीं होय गर्भिणी ॥ तरी महातामसी जन्मे प्राणी ॥ तो होमकाळ साधोनी ॥ कैकसी मागे भोगातें ॥२९॥

स्वस्त्रीस भोग न दे जरी ॥ तरी बाळहत्त्या पडे त्याचे शिरीं ॥ होम द्यावया दुराचारी ॥ जाऊं नेदी ऋृषीतें ॥३०॥

परम क्षोभोनियां ऋषी ॥ अंगसंग केला तियेसी ॥ म्हणे तूं विप्रकन्या नव्हेसी ॥ महातामसी पापरूपे ॥३१॥

ब्रह्मराक्षस तुझें उदरीं ॥ पुत्र होतील दुराचारी । येरी पतीचे चरण धरी ॥ एक तरी सुपुत्र देइंजे ॥३२॥

रावण आणि कुंभकर्ण ॥ तिसरा भक्तराज बिभीषण ॥ तो पितृवरदानेंकरून ॥ साधु पूर्ण जन्मला ॥३३॥

कुंभकर्ण जेव्हां जन्मला ॥ मुख पसरोन टाहो फोडिला ॥ तेणें भूगोळ थरारिला ॥ प्रळय गमला जीवांसी ॥३४॥

ताटिका शूर्पणखा भगिनी जाण ॥ तरी त्यांत रत्न बिभीषण ॥ जैसा कागाविष्ठेंत अश्र्वत्थ पावन ॥ केवळ स्थान विष्णूचें ॥३५॥

कीं वासयांत कोकिळा श्रेष्ठ केवळ ॥ कीं शिंपीमाजीं मुक्ताफळ ॥ कीं दैत्यकुळीं भजनशीळ ॥ प्रल्हाद पूर्वीं जन्मला ॥३६॥

यावरी गोकर्णतीर्थीं जाऊन ॥ तिघे करिती अनुष्ठान ॥ रावणें आराधिला अपर्णारमण ॥ कुंभकर्णें कमलोद्भव ॥३७॥

श्रीविष्णूचें आराधन ॥ करिता जाहला बिभीषण ॥ ब्रह्मा येऊनि वरदान ॥ देता जाहला तिघांतें ॥३८॥

रावण मागे वरदान ॥ इंद्रादिदेव काद्रवेयगण ॥ यांसी बंदिशाळे रक्षीन ॥ सर्वांसी मान्य आज्ञा माझी ॥३९॥

संपत्ति संतति विद्याधन ॥ व्हावे सकळकळाप्रवीण ॥ याउपरि कुंभकर्ण ॥ वर मागे अपेक्षित ॥४०॥

तों देव जाहले उद्विग्न ॥ काय मागेल कुंभकर्ण ॥ कीं हें चराचर भक्षीन ॥ ऐसें वरदान मागेल काय ॥४१॥

कीं गिळीन म्हणे भूगोळ ॥ कीं दाढे घालीन ऋृषिमंडळ ॥ मग सरस्वतीतें देव सकळ ॥ प्रार्थिते जाहले तेधवां ॥४२॥

तूं जिह्णाग्रीं वससी देवी ॥ तरी त्या दुष्टासी भ्रांति घालावी ॥ लोकीं सुखी राहिजे सर्वीं ॥ ऐसें वदवीं सरस्वती ॥४३॥

कुंभकर्ण आधींच राक्षस ॥ सरस्वती भ्रांति घाली विशेष ॥ तों विधि म्हणे घटश्रोत्रास ॥ अपेक्षित माग कांहीं ॥४४॥

मग बोले कुंभकर्ण मज निद्रा दे कां संपूर्ण ॥ अखंड करीन मी शयन ॥ चतुरानन अवश्य म्हणे ॥४५॥

तत्काळ निद्रा येऊन ॥ पडिला जैसा प्राणहीन ॥ सुषुप्तीमाजी सर्वज्ञान ॥ बुडोन गेलें तयाचें ॥४६॥

मंदराचळ आडवा पडला ॥ कीं महावृक्ष उन्मळला ॥ निद्राभरें घोरूं लागला ॥ तेणें दश दिशा घुमघुमती ॥४७॥

म्हैसे हस्ती श्र्वापदें काननीं ॥ श्र्वासासरसीं प्रवेशती घ्राणीं ॥ उच्छास टाकितां धरणीं ॥ बाहेर पडती आरडत ॥४८॥

निद्रा देहाची समाधी जाण ॥ निद्रा जीवात्म्याचें आवरण ॥ कीं भ्रांतीचें विश्रांतिस्थान ॥ कीं अज्ञान मूर्तिमंत ॥४९॥

निद्रा तस्काराची सहकारी ॥ ध्याना अनुष्ठाना विघ्न करी ॥ चातुर्य विद्या कळाकुसरी ॥ निद्रेमाजी बुडती पैं ॥५०॥

निद्रा मरणाची सांगातिणी ॥ निद्रा रात्रीची ज्येष्ठ भगिनी ॥ निद्रा जीवाची विश्रांतिकारिणी ॥ आयुष्य हरोनी नेतसे ॥५१॥

स्थूळ सूक्ष्म कारणें पाहीं ॥ बुडोन जाती सुषुप्तीडोहीं ॥ असो कुंभकर्णास शुद्धि नाहीं ॥ जागा कदा नोहेचि ॥५२॥

कुंभरकर्ण निद्रासागरीं ॥ बुडोन गेला अहोरात्रीं ॥ पिता देखोन चिंता करी ॥ म्हणे व्यर्थ जन्म याचा ॥५३॥

मग तेणें प्रार्थिला कमळासन ॥ मागतसे हें वरदान ॥ षण्मास जाहलिया एक दिन ॥ सर्व सुखभोग यातें असो ॥५४॥

मग बिभीषणासी चतुर्वक्र ॥ म्हणे माग इच्छित वर ॥ तंव तो सत्त्वशीळ पवित्र ॥ काय बोलतां जाहला ॥५५॥

म्हणे सत्समागम सच्छास्त्रश्रवण ॥ दया क्षमा उपरति भजन ॥ निंदा वाद द्वेष गाळून ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५६॥

आशा तृष्णा मनसा कल्पना ॥ भ्रांति भुली इच्छा वासना ॥ ममता अअविद्या सांडूनि जाणा ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५७॥

काम क्रोध मद मत्सर ॥ मोह लोभ अहंकार ॥ हे दूर करोनि साचार ॥ विष्णुचिंतन करीन मी ॥५८॥

धन्य बिभीषणाची स्थिती ॥ केवळ ओतिली सुखाची मूर्ती ॥ कीं भक्तिरूप श्रीरामकीर्ती ॥ विस्तारिली आधीं पुढें ॥५९॥

सूर्याआधीं उगवे अरुण ॥ कीं ज्ञानाअगोदर भजन ॥ कीं भजनाआधीं वैराग्य पूर्ण ॥ तैसा बिभीषण जन्मला ॥६०॥

तपाअगोदर शुचित्व पूर्ण ॥ कीं बोधाआधीं सत्त्वगुण ॥ कीं सत्त्वाआधीं अद्भुत पूर्ण ॥ पुण्य जैसें प्रगटतें ॥६१॥

कीं साक्षात्काराआधीं निजध्यास ॥ मननाआधीं श्रवण विशेष ॥ कीं श्रवणाआधीं सुरस ॥ आवडी पुढें ठसावे ॥६२॥

कीं शमदमाआधीं विरक्ती ॥ कीं आनंदाआधीं उपरती ॥ कीं आत्मसुखाआधीं शांती ॥ पुढें येऊन ठसावे ॥६३॥

तैसा आधीं जन्मला बिभीषण ॥ जैसें फळा अगोदर सुमन ॥ विधी संतोषला ऐकोन ॥ म्हणे वंश धन्य याचेनि ॥६४॥

रामउपासक जे संत ॥ तयांचीं लक्षणें हींच निश्र्चित ॥ अमानित्व अदंभित्व ॥ अहिंसादि सर्व गुण जेथें ॥६५॥

अंतरीं निग्रह करून ॥ शांतिरसें भरले पूर्ण ॥ आत्मस्तुति मनांतून ॥ स्वप्नीं जयांसी नावडे ॥६६॥

दुज याचे दोषगुणरीती ॥ हें कधीं नावडे जयांचे चित्तीं ॥ पराचे उत्तम गुण वनिती ॥ न विसरती कदाही ॥६७॥

गर्व नेणती अणुमात्र ॥ कोणसी न बोलती निष्ठुर ॥ आपुली निंदा ऐकतां साचार ॥ तिरस्कार नुपजेचि ॥६८॥

जैसे मेघ क्षारजळ प्राशिती ॥ परी पृथ्वीवरी गोड वर्षती ॥ धेनु तृण भक्षोनि देती ॥ क्षीर अमृतासारिखें ॥६९॥

इक्षुदंडासी घालिती खत ॥ तरी गोड होय रसभरित ॥ गंगा पाप जाळूनि पुण्य देत ॥ तैसे संत जाणावे ॥७०॥

परिस लोहकाळिमा झांकोन ॥ तत्काळचि करी सुवर्ण ॥ तैसेचि महाराज सज्जन ॥ परदोष लपविती ॥७१॥

जैसी कुळवंत कामिनी ॥ अवयव झांकी क्षणोक्षणीं ॥ तैसें आपुलें सुकृत झांकोनी ॥ सज्जन जन ठेविती ॥७२॥

असो सर्वलक्षणयुक्त ॥ बिभीषण परम भक्त ॥ तयासी विष्णुनाभ सत्य ॥ वर देता जाहला ॥७३॥

विरिंचि म्हणे साचार ॥ तुज भेटेल श्रीरघुवीर ॥ तो चिरंजीव करील निर्धार ॥ शशी-मित्र असती जों ॥७४॥

रावण कुंभकर्ण ते वेळे ॥ मेळवूनि राक्षसदळें ॥ प्रहस्त महोदर धांविन्नले ॥ प्रधान जाहले रावणाचे ॥७५॥

विद्युज्जिव्ह जंबुमाळी ॥ वज्रदंष्ट विरूपाक्ष बळी ॥ खर दूषण त्रिशिरा सकळी ॥ विद्युन्माली माल्यवंत ॥७६॥

मत्त महामत्त युद्धोन्मत्त ॥ शुक सारण दुर्धर समस्त ॥ बळ महाबळ धांवत ॥ रावणा वेष्टित सर्वही ॥७७॥

सकळ दळभार घेऊन ॥ लंकेवरी गेला रावण ॥ कदा नाटोपे वैश्रवण ॥ बहुदिन युद्ध करितां ॥७८॥

मग रावणें काय केलें ॥ पितयाचें पत्र आणिलें ॥ कुबेरासी पाठविलें ॥ येरें वंदिलें मस्तकीं ॥७९॥

उकलोनि वाची वैश्रवण ॥ आंत लिहिलें वर्तमान ॥ तुझा सापत्नबंधू रावण ॥ लंकाभुवन यास दीजे ॥८०॥

पितृआज्ञा ते वेदवचन ॥ मानोनि निघाला वैश्रवण ॥ सकळ संपत्ति पुष्पकीं घालोन ॥ विरिंचीपासीं गेला पै ॥८१॥

मग कनकाद्रीचे पाठारीं ॥ निर्मूनि अलकावती पुरी ॥ कुबेर तेथें ते अवसरीं ॥ विष्णुसुतें स्थापिला ॥८२॥

मयासुर मंदोदरी आणि शक्ती ॥ देता जाहला रावणाप्रती ॥ दीर्घज्वाळा बळीची पौत्री ॥ ते दीधली कुंभकर्णा ॥८३॥

सरमानामें गंधर्वकन्या ॥ ते दिधली बिभिषणा ॥ सकळ भूप शरण रावणा ॥ लंकेसी येती भेयेंचि ॥८४॥

रावणें सर्व देश जिंकिले ॥ गाईब्राह्मणांसी धरोनी बळें ॥ मुखीं घालोनियां सगळे ॥ दाढेखाली रगडित ॥८५॥

आकांतलें पृथ्वीचे जन ॥ कोठें लपावया नाहीं स्थान ॥ मग कुबेरें स्वर्गीहून ॥ सांगोनि पाठविलें रावणा ॥८६

कुबेरसेवक बोले वचन ॥ तुम्ही ऋषिपुत्र वेदसंपन्न ॥ टाकिली वेदांचीं खंडें करून ॥ शास्त्रज्ञान नसे तुम्हां ॥८७॥

आम्ही जाणते एक सृष्टीं ॥ ऐसा अभिमान वाहतां पोटीं ॥ गोब्राह्मण देखतां दृष्टीं ॥ मारितां कैसे अधर्मी हो ॥८८॥

समजोनियां शास्त्रार्थ ॥ मग कर्में करणें अनुचित ॥ त्यासी ऐहिक ना परमार्थ ॥ भोगील अनर्थ अनेक तो ॥८९॥

अवलक्षणी कुरूपी देख ॥ दर्पणीं न पाहे आपुलें मुख ॥ तोंवरीच अभिमान अधिक ॥ स्वस्वरूपाचा वाहतसे ॥९०॥

तैसे दोष आचरती ॥ मग धर्मशास्त्र विलोकिती ॥ परी वीट न मानिती चित्तीं ॥ नवलरीती हे वाटे ॥९१॥

ऐसें बोलतां कुबेरदूत ॥ रावण क्रोधावला अद्भुत ॥ व्याघ्रमुखीं मुष्टिघात ॥ ताडितां जेंवी खवळे पैं ॥।९२॥

पदीं ताडितां महाउरग ॥ कीं शुंडा पिळितां मातंग ॥ कीं घृतें शिंपितां सवेग ॥ पावक जैसा खवळे पैं ॥९३॥

ऐसा सक्रोध रावण ॥ सकळ दळभार सिद्ध करून ॥ रात्रीमाजी जाऊन ॥ घाला कुबेरावरी घातला ॥९४॥

संपदा आणि पुष्पक ॥ वस्तू हरिल्या सकळिक ॥ मग तो कुबेर यक्षनायक ॥ गेला शरण शक्रातें ॥९५॥

मग तो कुबेर ते वेळां ॥ शक्रें कोशगृहीं ठेविला ॥ असो रावणासी पुत्र जाहला ॥ मेघनाद प्रथमचि ॥९६॥

एक लक्ष पुत्रसंतति ॥ सवा लक्ष पौत्रोत्पति ॥ ऐशीं सहस्र युवती भोगितां रावण न धाये ॥९७॥

अठरा अक्षौहिणी वाजंत्रीं ॥ गर्जताती अहोरात्रीं ॥ पृथ्वीचे भूप महाद्वारीं ॥ कर जोडूनि उभे सदा ॥९८॥

अस्तां जातां दिनकर ॥ कर्पूरदीपिका अठरा सहस्र ॥ पाजळोनि सभेसमोर ॥ निशाचर तिष्ठती ॥९९॥

इंद्राचिया भयें पर्वत ॥ रावणासी शरण येत ॥ शक्र आमुचे पक्ष छेदित ॥ रक्षीं त्वरित आम्हांसी ॥१००॥

लंकेश तयासी अभय देत ॥ तुम्ही गज व्हा अवघे पर्वत ॥ समस्त अचळां मानली मात ॥ जाहले उन्मत्त वारण ॥१॥

रावण देवांवरी चालिला ॥ मेघनादें इंद्र ते वेळां ॥ ऐरावतीसगट पाडिला ॥ निजबळें रणांगणीं ॥२॥

ऐसा सत्रावेळां सहस्रनेत्र ॥ जिंकी मंदोदरीचा पुत्र ॥ मग इंद्रजित नाम थोर ॥ ब्रीद तेथोन ऐसें बांधिलें ॥३॥

पाश घालोनि पाकशासन ॥ इंद्रजितें आणिला बांधोन ॥ मग विरिंची आला धांवोन ॥ होय प्रसन्न शक्रजिता ॥४॥

अपेक्षित देवोनि वर ॥ सोडविला पुरंदर ॥ मग रावणें देव समग्र ॥ सेवेलागीं ठेविले ॥५॥

शक्रें आणावे नित्य हार ॥ छत्र धरी रोहिणीवर ॥ रसाधिपती निरंतर ॥ वाहे नीर धांवतचि ॥६॥

गभस्ति होय द्वारपाळ ॥ कुबेर आणि अनिळ ॥ यांही सडासंमार्जन सकळ ॥ गृहामाजी करावें ॥७॥

वस्त्रे धूत वैश्र्वानर ॥ पुरोहित जाहला विष्णुपुत्र ॥ पांडित्य करी अंगिराकुमर ॥ नारद तुंबर गाती सदा ॥८॥

दहावेळां शिव पूजिला ॥ रावण दश वक्रें पावला ॥ वीस हस्त लाधला ॥ शिवही केला वश तेणें ॥९॥

कोणे एक समयी रावण ॥ पुष्पकविमानीं बैसोन ॥ कैलासगिरी चढतां पूर्ण ॥ तों नंदी रक्षण महाद्वारीं ॥११०॥

म्हणे नको जाऊं लंकापती ॥ शिव-उमा आहेत एकांतीं ॥ ऐसें ऐकतां मयजापती ॥ परम क्षोभ पावला ॥११॥

नंदीस म्हणे ते वेळे ॥ तुज मर्कटाचेनि बोलें ॥ मी न राहें कदाकाळें ॥ जाईन बळेंकरूनियां ॥१२॥

ऐसें बोलतां दशकंधर ॥ कोपला तेव्हां नंदिकेश्र्वर ॥ शापसस्त्र अनिवार ॥ ताडिलें सत्वर तेणेंचि ॥१३॥

म्हणे उन्मत्त तूं मूढमती ॥ तुज नर वानर रणीं वधिती ॥ तुवां दशरुद्र पूजिले नीगुती ॥ अकरावा मारुती प्रगटेल ॥१४॥

तो वानररूपें अवतरोन ॥ करील तुझें गर्वमोचन ॥ ऐकतां क्रोधावला रावण ॥ म्हणे हा उपडीन कैलासगिरी ॥१५॥

उचलोनियां कैलासपर्वत ॥ लंकेत नेईन क्षणांत ॥ म्हणोनि तळीं घातला हात ॥ समूळ उचलावयासी ॥१६॥

तें जाणोनि हिमनगजामात ॥ निजपदें दडपिला पर्वत ॥ सहस्र वर्षेंपर्यंत ॥ आक्रंदत रावण ॥१७॥

मग करी शिवाचे स्तवन ॥ प्रसन्न जाहला त्रिनयन ॥ दशवक्र दीधला सोडून ॥ आला परतोन लंकेसी ॥१८॥

एकदां रेवातीरीं ध्यानस्थ ॥ बैसला असतां मयजाकांत ॥ पुढें सिकतालिंग विराजित ॥ तों पाणी चढत माघारें ॥१९॥

सहस्त्रार्जुनें निजभुजेंकरून ॥ कोंडिलें नर्मदेचें जीवन ॥ ध्यान करितां रावण ॥ आकंठपर्यंत बुडाला ॥१२०॥

परम क्रोधावला दशमौळी ॥ धांवोनि आला तयाजवळी ॥ म्हणे कोण रे तूं ये स्थळीं ॥ रेवाजळ कोंडितोसी ॥२१॥

सहस्त्रार्जुनें कवळ घालून ॥ ग्रीवेसी धरिला दशवदन ॥ कीं मृगेंद्रें धरिला वारण ॥ जाहले प्राण कासाविस ॥२२॥

बहुकाळ बंदीं घातला ॥ मग पौलस्ति ऋषि धांविन्नला ॥ भिक्षा मागोनि तया वेळां ॥ सोडविला राक्षस ॥२३॥

बळीचिया नगरा देख ॥ बळेंचि आला लंकानायक ॥ जैसा व्याळाचे बिळीं मूषक ॥ चारा घेऊं प्रवेशला ॥२४॥

तों बळीचिया महाद्वारीं ॥ एक पुरुष उभा दंडधारी ॥ जयाचिया तेजामाझारी ॥ शशी-मित्र झांकोळती ॥२५॥

तो महाराज त्रिविक्रम ॥ देखोनि बळीचें निजप्रेम ॥ द्वारपाळ जाहला पुरुषोत्तम ॥ अज अजित जगद्रुरु ॥२६॥

मग तयासी म्हणे रावण ॥ बळीसी आणी बोलावून ॥ नाहीं तरी हे नगरी उचलोन ॥ पालथी घालीन सागरीं ॥२७॥

मग म्हणे वैकुंठविलासी ॥ तूं बळीचा प्रताप नेणसी ॥ आतांच येईल प्रत्ययासी ॥ जाईं वेगेंसी आंतौता ॥२८॥

मग आतां प्रवेशला त्वरित ॥ तों सभेसी बैसला विरोचनसुत ॥ तयासी म्हणे लंकानाथ ॥ करावया समर पातलों मी ॥२९॥

जैसा शुष्क तृणाचा पुतळा ॥ धरावया आला वडवानळा ॥ कीं वृषभ बळें माजला ॥ खोचूं धांवला सिंहासी ॥१३०॥

व्याघ्रासी धरीन म्हणे बस्त ॥ कीं आळीका सुपर्णावरी धांवत ॥ ऐरावतीचा मोडावया दांत ॥ शलभ जैसा सरसावला ॥३१॥

वृश्र्चिक धांवे सत्वर ॥ ताडावया खादिरांगार ॥ खद्योत म्हणे दिवाकर ॥ आंसडून पाडीन खालता ॥३२॥

तैसा बळीप्रति रावण ॥ सांगे आपुलें थोरपण ॥ कीं सरस्वतीपुढें मतिमंदें येऊन ॥ वाग्वाद आरंभिला ॥३३॥

हांसोनि बळी म्हणे ते वेळे ॥ या वैकुंठनाथे द्वारपाळें ॥ पूर्वीं नारसिंहरूप धरिलें ॥ प्रल्हाद भक्त रक्षावया ॥३४॥

नरसिंहगदाघायेंकरून ॥ हिरण्यकशिपूचें कर्णभूषण ॥ कुंडलें पडलीं उसळोन ॥ तीं उचलोन घेई तूं ॥३५॥

तीं उचलों गेला दशकंधर ॥ बळें लाविले वीसही कर ॥ जैसा मशकासी न ढळे कुंजर ॥ तैसें जाहलें रावणा पैं ॥३६॥

निस्तेज जाहला ते वेळीं ॥ तो बळीची राणी विंध्यावळी ॥ सारिपाट खेळतां प्रीतिमेळीं ॥ फांसा हातींचा उसळला ॥३७॥

तों बळी म्हणे रावणासी ॥ फांसा आणि वेगेंसीं ॥ परी तोही न उचले तयासी ॥ राक्षसासी खेद वाटे ॥३८॥

गदगदां हांसती दोघें जणें ॥ बंदीं घातले म्हणती देव याणें ॥ येथें आला युद्धाकारणें ॥ तों फासा यासी नुचलेचि ॥३९॥

जाहला परम अपमान ॥ माघार चालिला दशवदन ॥ तो मार्गी बळीचे सेवकजन ॥ त्यांणी रावण नागविला ॥१४०॥

घेतलीं वस्त्रें शस्त्रें हिरून ॥ मुखासी तेल मसी लावून ॥ वीसही हस्त बांधोन ॥ नगरामाजी हिंडविती ॥४१॥

एक अंगावावरी धुळी टाकिती ॥ एक दाढी धरोनि ओढिती ॥ एक बळेंचि बैसविती ॥ एक उठविती सवेंचि ॥४२॥

एक करिती शेणमार ॥ काकुळती येत दशकंधर ॥ पळों पाहे जंव बाहेर ॥ तंव द्वारपाळ जाऊं नेदी ॥४३॥

क्षुद्र द्वार मोरियेमधून ॥ मस्तक घाली जंव रावण ॥ तंव सर्वांठायी वामन ॥ दंडावरी मारित ॥४४॥

बळीचे अश्र्वशाळेंत रावण ॥ क्षुधाक्रांत हिंडे नग्न ॥ चणे खातसे वेंचून ॥ मागे कोरान्न घरोघरीं ॥४५॥

पोटासाठी वाघ्या होऊन ॥ म्हणे मी मल्हारीचा श्र्वान ॥ कोठंबे चोंडकें काखे घेऊन ॥ नाचोनि धान्य मेळवी ॥४६॥

तों दासींनी धरिला कौतुकें ॥ उदक आणितां घातला काखें ॥ तयां काकुळती येत दीनमुखें ॥ मग सोडिती सत्वर ॥४७॥

मग विश्रवा धांवोन ॥ बळीस भेटला येऊन ॥ म्हणे बंदीस घातला रावण ॥ तो भिक्षेस मज देइंजे ॥४८॥

बळी बोले आण वाहोन ॥ येथें कोणास नाहीं बंधन ॥ ग्रामांत असे रावण ॥ तो शोधोनि नेईजे ॥४९॥

तो बळीचे आश्र्वशाळेत देखिला ॥ पिता देखोनि रडूं लागला ॥ मग ऋषीनें वामन स्तविला ॥ सोडवून नेला रावण ॥१५०॥

परम लज्जित रावण ॥ लंकेसी आला परतोन ॥ मागुती पराक्रम धरोन ॥ म्हणे मी जिंकीन वाळीतें ॥५१॥

तों समुद्रतीरीं शक्रसुत ॥ बैसला असे ध्यानस्थ ॥ त्यासी धरावया लंकानाथ ॥ पुष्पकांतून उतरला ॥५२॥

जैसा पंचाननापुढें ॥ मार्जार दावी आपुले पवाडे ॥ कीं पंडितापुढें महामूढें ॥ वाग्वाद आरंभिला ॥५३॥

कीं रासभें ब्रीद बांधोन ॥ नारदापुढें मांडिलें गायन ॥ कीं महाव्याघ्रावरी टवकारून ॥ जंबूक जैसा पातला ॥५४॥

तैसा वाळीपुढें उभा रावण ॥ सावध होतां शक्रनंदन ॥ ग्रीवेसीं दशग्रीव धरोन ॥ कक्षेमाजी दाटिला ॥५५॥

चतुःसमुद्रीं करोनि स्नान ॥ किष्किंधेसी आला परतोन ॥ अंगदाच्या पाळण्यावरी नेऊन ॥ उफराटा रावण बांधिला ॥५६॥

क्षणाक्षणां धरोनि दाढी ॥ अंगद बाळभावे उपडी ॥ मग विश्रवा धांवोनि तांतडी ॥ भिक्षा मागे वाळीतें ॥५७॥

मग मुखासी काळें लावुनी ॥ वाळीनें दीधला भिरकावुनी ॥ लंकेंत पडिला येउनी ॥ खेद मनीं बहुत करी ॥५८॥

एकदां रावण पुसे विरंचित्तें ॥ आमुचा अंत कवणाचेनि हातें ॥ तें सत्य सांगावें आम्हांतें स्नेहचित्तेंकरूनियां ॥५९॥

विधि म्हणे अजपाळसुत ॥ त्याचें नाम विख्यात दशरथ ॥ त्यासी पुत्र होईल रघुनाथ ॥ तुझा अंत त्या हातें ॥१६०॥

रावणें केला मग पण ॥ तरी मी दशरथासी वधीन ॥ तों अजपाळपुत्राचें लग्न ॥ मांडिलें इकडे गजरेंसीं ॥६१॥

तो नारद सांगे अजपाळा ॥ जतन करी दशरथकौसल्या ॥ लग्नसोहळ्यामाजी घाला ॥ घालील अकस्मात रावण ॥६२॥

ऐसें सांगतां कमलोद्भवसुत ॥ मग जहाज घालोनि समुद्रांत ॥ लग्न आरंभिलें तेथ ॥ महागजरेंकरोनियां ॥६३॥

सागरामाजी होतें लग्न ॥ रावणें ही गोष्ट ऐकोन ॥ तंव तो अष्टवर्गाचा दिन ॥ घातला घाला रात्रींत ॥६४॥

जैसे अंतरिक्ष पक्षी येती ॥ तैसे राक्षस उड्या घेती ॥ जहाज फोडोनि चूर्ण करिती ॥ गदापर्वतघातेंचि ॥६५॥

वऱ्हाड सर्व बुडविलें ॥ रावण कौसल्येसी घेतलें ॥ जिचें स्वरूप न जाय वर्णिलें । तीस घातलें पेटींत ॥६६॥

पेटी लंकेसी नेता उचलोन ॥ राक्षसें बोलाविला एक मीन ॥ तो बाहेर आला सांगरांतून ॥ त्यासी रावण अज्ञापी ॥६७॥

ही पेटी करावी जतन ॥ कोणा न द्यावी मजवांचून ॥ लंकेत प्रवेशला रावण ॥ ती वस्तु जतन मत्स्य करी ॥६८॥

समुद्राचे गहन बेटीं ॥ जेथें न पडे कोणाची दृष्टी ॥ तेथें मत्स्यें ठेवूनि पेटी ॥ गेला आपण स्वकार्या ॥६९॥

कैंचा सोहळा कैचें लग्न ॥ लोक समग्र गेले बुडोन ॥ तरी दशरथ समुद्रांतून ॥ उफाळला अवचिता ॥१७०॥

ज्याचे पोटीं येणार श्रीराम ॥ दुर्गम तेंचि होय सुगम ॥ विष तें अमृत होय उत्तम ॥ अपाय तोचि उपाय ॥७१॥

तरी अंतरिक्ष चढे पांगुळ ॥ देव जरी होय दयाळ ॥ आंगणींच्या लता सकळ ॥ कल्पलता होती त्या ॥७२॥

दशरथ पाहे समुद्रांत ॥ तों भंगलें जहाज अकस्मात ॥ वाहात वाहात आलें तेथ ॥ त्यावरी दशरथ बैसला ॥७३॥

वायुवेगें जहाज गेलें ॥ त्याच बेटाशीं येऊनि लागलें ॥ दशरथे पेटी ते वेळे ॥ सहज लीलें उघडिली ॥७४॥

तों आंत कौसल्यानिधान ॥ पाहतां वेधला अजनंदन ॥ तो नारद अकस्मात येऊन ॥ उभा ठाके ते वेळी ॥७५॥

ज्यासी भूत भविष्य सर्व ज्ञान ॥ तेणें मुहूर्तवेळा पाहून ॥ तात्काळ दोघांसी लाविलें लग्न ॥ विधियुक्त विधिसुतें ॥७६॥

वोहरांसी आशीर्वाद देत ॥ जो वैकुंठवासी रमाकांत ॥ तो तुमचे पोटी अवतरेल सत्य ॥ भयभीत होऊं नका ॥७७॥

दोघे पेटींत बैसवून ॥ वेगें गेला ब्रह्मनंदन ॥ तों लंकेत दशवदन ॥ कमळासनाप्रति सांगे ॥७८॥

तुवां जें भविष्य कथिलें ॥ तें अवघेंचि असत्य झालें ॥ जहाज फोडूनि लोक बुडविले ॥ हिरोनि आणिलें कौसल्येसी ॥७९॥

मग बोले चतुरानन ॥ मघांच दोघांसी लाविले लग्न ॥ कदा न टळे ब्रह्मवचन ॥ कल्पांतीही दशवक्रा ॥१८०॥

येरू म्हणजे जर जाहले लग्न ॥ तरी मी तुज इच्छित देईन ॥ मग पेटी आणविली मत्स्यापासून ॥ सभेमध्यें रावणें ॥८१॥

त्यामाजी नवरी असे तत्वतां ॥ ब्रह्मा म्हण उघडी आतां ॥ तों पेटी उघडूनि पाहतां ॥ वोहरे उभयतां देखिली ॥८२॥

परम आश्र्चर्य करी रावण ॥ म्हणे खरें जाहलें ब्रह्मवचन ॥ तरी मी या दोघांसी वधीन ॥ शस्त्र घेऊन सरसावला ॥८३॥

कौसल्या जाहली भयभीत ॥ पतीचें वदन विलोकित ॥ परी निर्भय वीर दशरथ ॥ ना भी म्हणत कौसल्येतें ॥८४॥

मी सूर्यवंशीं महावीर ॥ हे मशक काय दशकंधर ॥ याचीं दाही शिरें समग्र ॥ खंडीन आतां येथेंचि ॥८५॥

मग रावणाचा हात ॥ धरिता जाहला विष्णुसुत ॥ म्हणे मज देईं इच्छित ॥ माग म्हणत दशवदन ॥८६॥

हीं दोघें वधूवरें आतां ॥ मज देईं लंकानाथा ॥ मंदोदरी म्हणे तत्वतां ॥ वचन असत्य न करावें ॥८७॥

गेला तरी जावो प्राण ॥ परी असत्य न करावें वचन ॥ यासी वधितां येथेंचि विघ्न ॥ उठेल दारुण आतांचि ॥८८॥

बुद्धीचा प्रवर्तक भगवंत ॥ ब्रह्मयासी म्हणे नेईं त्वरित ॥ तेणें पेटी उचलोन अकस्मात ॥ अयोध्येसी आणिली ॥८९॥

अयोध्येंत जाहला जयजयकार ॥ वेगें पातला शचीवर ॥ दशरथावरी धरी छत्र ॥ कर्तव्य विचित्र हरीचें ॥१९०॥

दशरथ राज्यीं स्थापून ॥ विधि आणि सहस्रनयन ॥ वेगें पावले स्वस्थान ॥ आनंदें मनी उचंबळले ॥९१॥

पुष्पकीं बैसोनि जातां दशकंधर ॥ एक देवस्त्री देखिली सुंदर ॥ तिचा बळेंचि धरिला कर ॥ तिसीं अविचार करि इच्छी ॥९२॥

तंव ते आक्रंदत नितंबिनी ॥ रावणें सोडिली तेचि क्षणीं ॥ ती ब्रह्मयापासी जाऊनी ॥ गाऱ्हाणे सर्व सांगत ॥९३॥

रावणासी सत्यलोकवासी ॥ परस्त्रीवर बलात्कार करिसी ॥ तरी शतखंडें निश्र्चयेंसी ॥ तुझें तनूचीं होतील ॥९४॥

जैसा सिंह आडांत पडिला ॥ कीं महाव्याघ्र सांपळ्यांत सांपडला ॥ तैसा रावण बांधला ॥ शापपाशेंकरोनियां ॥९५॥

रावण पाप करी दारुण ॥ गांजिले गाईब्राह्मण ॥ पृथ्वी आक्रंदल पूर्ण ॥ गेली शरण ब्रह्मया ॥९६॥

गाईच्या रूपं धरित्री ॥ आक्रंदे विरिंचीच्या द्वारीं ॥ प्रजा ऋषीगण ते अवसरीं ॥ शरण आले विधातया ॥९७॥

विधी बाहेर आला ते क्षणीं ॥ तो समस्त सांगती गाऱ्हाणीं ॥ रावणें यज्ञ टाकिले मोडोनी ॥ सत्कर्म अवनीं चालेना ॥९८॥

एक म्हणे माझिया मखां ॥ विघ्न करी नित्य ताटिका ॥ एक म्हणे सुबाहु मारीच देखा ॥ क्रतु माझा विध्वंसिती ॥९९॥

एक सांगती ऋषीश्र्वर ॥ आमचीं कुटुंबें समग्र ॥ कुंभकर्णें गा्रसिली थोर ॥ अनर्थ मांडिला विधातया ॥२००॥

त्रिदश आणि पुरंदर ॥ म्हणती बंदीं पडले समग्र ॥ कोणासी नाटोपे दशकंधर ॥ काय विचार करावा ॥१॥

मग देव प्रजा ऋषिगण ॥ मुख्य परमेष्ठी विष्णुनंदन ॥ क्षीरसागरासी येऊन ॥ अपार स्तवन मांडिलें ॥२॥

शेषशयन नारायण ॥ कोटि सूर्यांची प्रभा पूर्ण ॥ साठी सहस्र योजन ॥ शेषतल्पक शुभ्र तो ॥३॥

लक्षार्ध योजनें प्रमाण ॥ वरी पहुडला श्रीभगवान ॥ तो सच्चिदानंद रमारमण ॥ अलंकारें मंडित ॥४॥

जे अनंत शक्तींची स्वामिणी ॥ कमला विलसत चरणी ॥ जिच्या इच्छामात्रें करूनी ॥ ब्रह्मांड हें विस्तारलें ॥५॥

एक लक्ष योजनें दैदीप्य ॥ विराजमान मध्य मंडप ॥ तेथींचें तेज पाहतां अमूप ॥ मार्तंड शशी लोपती ॥६॥

गरुडपाचूंचें जोतें स्वयंभ ॥ वरी हिऱ्याचे विशाळ स्तंभ ॥ माणिकांची उथाळीं सुप्रभ ॥ खालीं तोळंबे हिरियांचे ॥७॥

सुवर्णाची तुळवटें प्रचंडें ॥ आरक्त रत्नांचे पसरिले दांडे ॥ वरी किलच्या झळकती निवाडें ॥ गरुडपाचूंचिया साजिऱ्या ॥८॥

असो पैलतीरीं देव सकळी ॥ उभे ठाकले बद्धांजुळीं ॥ म्हणती पूर्णब्रह्म वनमाळी । भक्तपाळका सर्वेशा ॥९॥

जयजय अनंत ब्रह्माडनायका ॥ वेदवंद्या वेदपाळका ॥ विश्र्वंभरा विश्र्वव्यापका ॥ विश्र्वरक्षका जगद्रुरो ॥२१०॥

पुराणपुरुषा परात्परा ॥ पंकजलोचना पयोब्धिविहारा ॥ परमात्मया परम उदारा ॥ भुवनसुंदरा भवहृदया ॥११॥

कर्ममोचका करुणाकरा ॥ कैवल्यदायका कमळावरा ॥ कर्मातीता कैटभसंहारा ॥ कनकवसना करुणाब्धे ॥१२॥

जय जय सकळदेवपाळका ॥ जय जय सकळचित्तचाळका ॥ निर्विकारा निरुपाधिका ॥ निर्गुणा निश्र्चळा निःसंगा ॥१३॥

केशवा हरी मुरमर्दना ॥ रमावल्लभा मधुसूदना ॥ सकळदुरितकाननदहना ॥ तमनाशना प्रतापसूर्या ॥१४॥

प्रळयसमुद्रीं तूं जनार्दना ॥ विशाळ मीनरूप धरून ॥ महादैत्य विदारून ॥ वेदोद्धार तुवां केला ॥१५॥

परम विशाळ मंदराचळ ॥ भेदित चालिला पाताळ ॥ तूं कूर्मरूप धरूनि घननीळ ॥ पृष्ठी खालती दीधली ॥१६॥

हिरण्याक्ष दैत्य सबळ ॥ कांखेसी घेऊन जातां भूमंडळ ॥ वराहवेष तूं तमाळनीळ ॥ दानव सकळ मर्दिले ॥१७॥

दानवबाळकप्रल्हाद ॥ त्यास तुझा अखंड छंद ॥ मग करूनि स्तंभभेद ॥ प्रकटलासी नरहरी ॥१८॥

इंद्राचे कैवारें बळी ॥ तो तुवां घातला पाताळीं ॥ त्याचे द्वारीं तू वनमाळी ॥ द्वारपाळ अद्यापी ॥१९॥

नसतां सेना रथ सेवक ॥ फरशधर तूं भृगुकुलतिलक ॥ तीन सप्तकें उर्वी निःशंक ॥ निक्षत्री केली हरी त्वां ॥२०॥

आतां रावण कुंभकर्ण असुर ॥ इहीं त्रिभुवन पीडिलें समग्र ॥ भक्तकैवारी तूं सर्वेश्र्वर ॥ रक्षी सत्वर दासांतें ॥२१॥

तों क्षीरसागरींहूनि अद्भुत ॥ ध्वनि उठली अकस्मात ॥ रविकुळीं राजा दशरथ ॥ अवतार तेथें घेतों मी ॥२२॥

शेष होईल लक्ष्मण ॥ भरत होईल पांचजन्य ॥ सुदर्शन तोचि शत्रुघ्न ॥ अवतार पूर्ण हे माझे ॥२३॥

जनकराजा मिथिलापुरीं ॥ कमळा जाईल त्याचे उदरीं ॥ तुम्ही देव एकसरीं ॥ वानररूपें अवतरा ॥२४॥

शिव तो होईल हनुमंत ॥ ब्रह्मा तो ऋक्ष जांबूवंत ॥ धन्वंतरी तो सुषेण सत्य ॥ अंगिरापति तो अंगद जाणिजे ॥२५॥

अदिति आणि कश्यप ॥ तेचि कौसल्या आणि दशरथ भूप ॥ तेथें अवतरेल चित्स्वरूप ॥ आत्माराम रघुवीर ॥२६॥

सुग्रीव तो जाणिजे मित्र ॥ नळ तो अनळ साचार ॥ नीळ अनिळअवतार ॥ यम तोचि ऋृषभ पैं ॥२७॥

ऐशी आज्ञा होतां समस्त ॥ देव जयजयकारें गर्जत ॥ आनंद न माय अंबरांत ॥ गेले त्वरित स्वस्थाना ॥२८॥

श्रीरामकथा अति रसाळ ॥ हेंचि मानससरोवर निर्मळ ॥ तुम्ही चतुर श्रोते मराळ ॥ बैसा सकळ एकपंक्तीं ॥२९॥

श्रीरामकथा करितां श्रवण ॥ होय पापांचें सर्व खंडण ॥ चिंतिले मनोरथ होती पूर्ण ॥ भक्तिकरून वाचितां ॥२३०॥

श्रोतयांसीं पडतां विघ्न ॥ श्रीराम निवारित स्वयें आपण ॥ सर्व काल रामचरणीं लीन ॥ असतां भवबंधन चुकेल ॥३१॥

ब्रह्मानंदा आत्मयारामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ श्रीधरवरदा पूर्णब्रह्मा ॥ अक्षय अनामा अभंगा ॥३२॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वितीयाध्याय गोड हा ॥२३३॥

श्रीरामचंद्रार्पणमस्तु

श्रीरामविजयअध्याय रा

श्रीगणेशाय नमः ॥ तुम्ही संत श्रोते भाविक ॥ कविमुद्रारत्नपरीक्षक ॥ श्रोता देखोनि मृगांक ॥ वक्ता सोमकांत पाझरे ॥१॥

तुम्ही बोधसमुद्रींचीं मुक्तें पवित्रें ॥ कीं चैतन्यनभींची दिव्य नक्षत्रें ॥ की वैराग्यवनींचीं सुमनें विचित्रें ॥ संतरूपें विकासलीं ॥२॥

निवडलीं रामकथामृतपात्रें ॥ की ज्ञानभरित पिकलीं क्षेत्रें ॥ कीं भजनपंथींचीं सरोवरें ॥ संतरूपें भरिलीं हो ॥३॥कीं भवजलदजालप्रभंजन ॥ अज्ञानतिमिरच्छेदक चंडकिरण ॥ जो कां मदगजविदारक पंचानन ॥ मत्सरकाननदहन जो ॥४॥

रामविजय ग्रंथ वैरगर ॥ साहित्यरत्नें निघती अपार ॥ हीं तुम्ही अंगिकारावीं वारंवार ॥ कासयासी प्रार्थावें ॥५॥

कमळकोशींचा मकरंद बरा ॥ हें नलगे सांगावें भ्रमरा ॥ राजहंसासी घे मुक्तचारा ॥ ऐसें किमर्थ प्रार्थावें ॥६॥

शीतळ होई चंद्रमंडळा ॥ कासया सांगावें वेळोवेळां ॥ मित्रासी प्रकाश आगळा ॥ पाडीं कासया म्हणावें ॥७॥

संतांसी धरा क्षमा शांती ॥ ऐसें वदे तोचि मंदमती ॥ प्रेमळासी करीं भक्ती ॥ सांगावें नलगेचि हें ॥८॥

तैसे पंडित तुम्ही ज्ञानघन ॥ करा सुरस रामकथाश्रवण ॥ हें वारंवार म्हणतां दूषण ॥ वक्त्यासी झगटेल ॥९॥

असो पूर्वाध्यायीं कथा निश्र्चिती ॥ सांगितली रावणाची उत्पत्ति ॥ कौसल्या दशरथ अयोध्येप्रति ॥ नेऊनि विधीनें स्थापिलीं ॥१०॥

सूर्यवंशभूषण अद्भत ॥ अयोध्यापति राजा दशरथ ॥ ज्याची पट्टराणी विख्यात ॥ कुशल बहुत कौसल्या ॥११॥

सुमित्रा कैकयी स्वरूपवंत ॥ दोघींस वरी राव दशरथ ॥ आणीक सातशें परिणीत ॥ भोगांगना सुंदरा ॥१२॥

ज्ञानकळा कौसल्या सती ॥ सुमित्रा केवळ सद्भक्ती ॥ कैकयी ते कपटप्रकृती ॥ रजतमयुक्त सर्वदा ॥१३॥

केवळ विवेक मूर्तिमंत ॥ तोचि अजसुत दशरथ ॥ जो परमयोद्धा रणपंडित ॥ धनुर्विद्या सर्व जाणे ॥१४॥

अंधारामाजी शब्द उठतां ॥ तेथेचि बाण मारी अवचिता ॥ धन्य त्याची हस्तकुशलता ॥ वीर दशरथाऐसा नसे ॥१५॥

परी पोटीं नसे पुत्रसंतान ॥ तेणें राजेंद्र असे उद्विग्न ॥ पुत्राविण शून्य सदन ॥ बोलती शास्त्रज्ञ पंडित ॥१६॥

शरीर जैसें प्राणाविण ॥ तारुण्याविण पंचबाण ॥ दयेविण व्यर्थ ज्ञान ॥ शांतीवांचून वैराग्य ॥१७॥

संपत्ति जैशी धर्मेविण ॥ पंडितावांचून सभासदन ॥ कीं करणीविण व्यर्थ ज्ञान ॥ दीपेंविण मंदिर जेंवी ॥१८॥

कीं वेदांतज्ञानावांचून ॥ कोरडी व्युत्पत्ति व्यर्थ ज्ञान ॥ कीं सत्पात्रावांचून दान ॥ कीं स्नेहेंविण बंधु जैसा ॥१९॥

कीं जळेंविण वापिका ॥ कीं नृपाविण नगर देखा ॥ कीं नासिकाविण मुखा ॥ शोभा जैसी न येचि ॥२०॥

कीं फळेंविण तरुवर ॥ कीं रामस्मरणाविण मंदिर ॥ तैसा पुत्राविण वंश पवित्र ॥ सर्वथा पावन नव्हेचि ॥२१॥

असो राजा दशरथ ॥ संततीलागीं चिंताक्रांत ॥ सदा विपिनें गहन हिंडत ॥ मृगयामिषेंकरोनियां ॥२२॥

नावडे छत्रसिंहासन ॥ नावडे चातुर्यकळा गायन ॥ बहुत केले प्रयत्न ॥ परी संतान नव्हेचि ॥२३॥

तों दशरथें स्वप्न देखिलें ॥ दोघे पुरुष आपण वधिले ॥ आणि एके स्त्रियेसी मारिलें ॥ अपराधेंविण तत्त्वतां ॥२४॥

गजबजोनि उठला त्वरित ॥ कोणासी न बोले मूकवत ॥ वसिष्ठगृहास जाऊन त्वरित ॥ नमोनि स्वप्न सांगतसे ॥२५॥

गुरु बोले हें दुष्ट स्वप्न ॥ तीन श्र्वापदें येईं वधोन ॥ मग याची शांति करून ॥ दोषनिवारण करावें ॥२६॥

गुरुआज्ञेनें ते दिवशी ॥ राजेंद्र निघाला मृगयेसी ॥ वासरमणि गेला अस्तासी ॥ परी श्र्वापद न सांपडे ॥२७॥

पडला अत्यंत अंधकार ॥ एकला हिंडे नृपवर ॥ धनुष्यासी लावून शर ॥ शोधी कांतार तेधवां ॥२८॥

तों एका सरोवराचे तीरीं ॥ राजा गुप्त बैसे वृक्षावरी ॥ कानाडी ओढूनि ते अवसरीं ॥ कर्णीं ऐके सांचोल ॥२९॥

तों ते मार्गीं श्रावण ॥ आला मायबाप घेऊन ॥ दिवसा बहुत विघ्नें आणि उष्ण ॥ म्हणोनि रात्रीं गमन करी ॥३०॥

दोघें वृद्धें खांदीं घेऊनी ॥ श्रावण तीर्थें हिंडे मेदिनी ॥ त्या सरोवराचे तीरीं येऊनी ॥ उभा राहिला नावेक ॥३१॥

तों तीं वृद्धें म्हणती श्रावणा ॥ आम्हां करवी उदकपाना ॥ ऐकतां ऐसिया वचना ॥ कावड खालीं ठेविली ॥३२॥

हातीं कमंडलु घेऊन ॥ जीवनांत प्रवेशला श्रावण ॥ दशरथें सांचोल ऐकोन ॥ निर्वाण बाण सोडिला ॥३३॥

सपक्ष बाण हृदयीं भेदला ॥ हातींचा कमंडलु खालीं पडला ॥ देह भूमीवरी टाकिला ॥ प्राण चालिला श्रावणाचा ॥३४॥

म्हणे कोणे सभाग्याचा बाण ॥ करीत आला रामस्मरण ॥ हृदय निवालें संपूर्ण ॥ केलें पावन मजलागीं ॥३५॥

ऐकोनि मनुष्याचें वचन ॥ नृपवर जवळी आला धांवोन ॥ तंव तो पडिलासे श्रावण ॥ रामस्तवत करीतचि ॥३६॥

मग म्हणे कर्म पापकारी ॥ पडली हत्त्या मजवरी ॥ श्रावण म्हणे राया न करीं ॥ खेद कांहीं सर्वथा ॥३७॥

माझीं मायबापें वृद्धें दीन ॥ तयांसी करवीं उदकपान ॥ मग मी सोडीन प्राण ॥ सत्य जाण राजेंद्रा ॥३८॥

दोघें वृद्धें अत्यंत पाहीं ॥ त्यांचे सेवेसी कोणी नाहीं ॥ दशरथ गहिंवरला हृदयीं ॥ शोकाकुलित जाहला ॥३९॥

श्रावण म्हणे दशरथा ॥ उदक दोघां पाजूनि त्वरिता ॥ मग हे सांगावी वार्ता ॥ नाहीं तरी प्राण त्यागिती ॥४०॥

उदक नेतां अयोध्याराणा ॥ वृद्धें म्हणती बा रे श्रावणा ॥ तंव तो न बोलेचि वचना ॥ कांही केलिया सर्वथा ॥४१॥

कांरे श्रावणा न बोलसी ॥ उदक मागितलें येवढे निशीं ॥ बा रे म्हणोनि कोपलासी ॥ शीणलासी पाडसा ॥४२॥

उदयाचळीं मावळेल मित्र ॥ शेष सांडील भूभिभार ॥ तीव्र तपेल रोहिणीवर ॥ तरी क्रोध अणुमात्र न ये तूतें ॥४३॥

जैसें गंगेचें निर्मळ जीवन ॥ तैसें श्रावणा तुझें मन ॥ तान्हया कां रे न बोलसी वचन ॥ राजा ऐकोनि गहिंवरे ॥४४॥

मग अजराजपुत्र बोलिला ॥ म्यां अवचितां श्रावण वधिला ॥ तंव तिहीं धरणीवर देह टाकिला ॥ प्राण जाहला कासाविस ॥४५॥

आठवोनि श्रावणाचे गुण ॥ दोघें आक्रंदती दीनवदन ॥ ऐसा पुत्र हें त्रिभुवन ॥ शोधितांही न सांपडे ॥४६॥

आहा रे पुत्रा श्रावणा ॥ गंभीरा गुणनिधाना ॥ आमुचे प्राण करिती प्रयाणा ॥ श्रावणा वदन दावीं कां ॥४७॥

या ब्रह्मांडमंडपांत ॥ श्रावणाऐसा नाहीं सुत ॥ जैसीं लक्ष्मी आणि वैकुंठनाथ ॥ तैसीं भावित मातापिता ॥४८॥

जो न करी मातृपितृभजन ॥ जळो त्याचें ब्रह्मज्ञान ॥ तो षट्शास्त्रें आला पढून ॥ तरी त्याचें दर्शन न व्हावें ॥४९॥

त्याचें जप तप अनुष्ठान ॥ दान अध्ययन श्रवण मनन ॥ कळा चातुर्य व्यर्थ ज्ञान ॥ जैसें भाषण मद्यपियाचें ॥५०॥

तेणें अभ्यासिल्या चौसष्टी कळा ॥ त्या अवघ्याचि जाहल्या विकळा ॥ जयासी मातापित्यांचा कंटाळा ॥ त्या चांडाळा न शिवावें ॥५१॥

माता पिता गुरु देव जाण ॥ चारी दैवतें समसमान ॥ तोचि परम ज्ञाता जाण ॥ न मोडी वचन श्रेष्ठाचें ॥५२॥

म्हणोनि पुत्र एक श्रावण ॥ आठवूनि तयाचे गुण ॥ दोघें पडली मूर्च्छा येऊन ॥ जावया प्राण एकवटले ॥५३॥

मग तीं शाप देती प्राण जातां ॥ म्हणती तुझाही पुत्र पुत्र करितां ॥ प्राण जाईल रे दशरथा ॥ आम्हां ऐसाचि तात्काळ ॥४४॥

मग तिहीं सोडिला प्राण ॥ रायें केलें तिघांचें दहन ॥ उत्तरकार्य संपादून ॥ अयोध्येसी परतला ॥५५॥

मनांत हर्ष मानी नृपवर ॥ मज शाप जाहला तो केवळ वर ॥ यांचे शापें तरी पुत्र ॥ हो कां सत्वर मजलागीं ॥५६॥

अयोध्येसीं आला दशरथ ॥ वसिष्ठासी सांगितला वृत्तांत ॥ पुढें द्वादश वर्षेंपर्यंत ॥ दुष्काळ पडला पृथ्वीवरी ॥५७॥

न वर्षे कदा बलाहक ॥ अत्यंत तीव्र तपे अर्क ॥ धन्य तृण जीवन सकळिक ॥ नाहीं निष्टंक पृथ्वीवर ॥५८॥

गायी ब्राह्मण पीडिले बहुत ॥ दैत्यगुरु परम कापट्यवंत ॥ तेणें जलद आकर्षिले समस्त ॥ वृष्टी एकाक्ष होऊं नेदी ॥५९॥

वृष्टी जाहलिया परिपूर्ण ॥ सुखी होती गोब्राह्मण ॥ ते करितील महायज्ञ ॥ सुरांस पूर्ण बळ तेणें ॥६०॥

वृषपर्वा दैत्येंद्र थोर ॥ त्यासी साह्य जाहला शुक्र ॥ निर्जरभारांसहित शक्र ॥ युद्ध करीत तयांसीं ॥६१॥

बहुत दिवस जाहला संग्राम ॥ परी शुक्र कपटी पूर्ण परम ॥ मेघ वर्षो नेदी अधम ॥ सुत्रामा चिंताक्रांत बहुत ॥६२॥

वज्रधरासी म्हणे अंगिरासुत ॥ अयोध्येचा राजा दशरथ ॥ तो प्रतापार्क रणपंडित ॥ जिंकील दैत्य क्षणमात्रें ॥६३॥

मग मातली आणि विजयरथा ॥ मूळ पाठविलें दशरथा ॥ मातली सांगे समूळ वार्ता ॥ अनावृष्टिकारणें जें ॥६४॥

ऐकोनि दैत्यप्रताप अद्भुत ॥ तत्काळ रथीं बैसला दशरथ ॥ तों कैकयी रायास प्रिय अत्यंत ॥ काय बोलत तेधवां ॥६५॥

म्हणे मी समागमें येईन ॥ आणि संग्राम तुमचा पाहीन ॥ राजा म्हणे तूं सुकुमार पूर्ण ॥ युद्धकंदन ते स्थानीं ॥६६॥

येरी म्हणे तुम्हीं जवळी असतां ॥ मज भय नाहीं सर्वथा ॥ ऐसे तिचे बोल ऐकतां ॥ घेतली रथावरी तेधवां ॥६७॥

निराळमार्गें रथ तेवेळीं ॥ घेऊनि जात चपळ मातली ॥ देवदैत्यांच्या रणमंडळीं ॥ रथ अकस्मात उतरला ॥६८॥

वैकुंठीहूनि विनतासुत ॥ क्षीराब्धितटीं उतरे अकस्मात ॥ तैसा राजा दशरथ ॥ सुरसमुदायांत उतरला ॥६९॥

अजपुत्र देखानि पाकशासन ॥ देता जाहला क्षेमालिंगन ॥ दशरथ धनुष्य चढवून ॥ उभा ठाकला रणांगणीं ॥७०॥

बाणापाठीं बाण सोडित ॥ जैसे शब्दामागें शब्द येत ॥ कीं मेघधारा वर्षत ॥ शर सोडित त्या रीतीं ॥७१॥

जैशा मेघाबाहेर निवडोनी ॥ निघती कल्पांतसौदामिनी ॥ तैसा एकेक बाण तूणीरांतुनी ॥ वोढोनि काढी दशरथ ॥७२॥

दैत्यांचीं शिरें अकस्मात ॥ गगनीं उडतीं असंख्यात ॥ जैसे वृक्षावरोनि पक्षी उडत ॥ प्रातःकाळीं एकदांचि ॥७३॥

माघारले दैत्यभार तेव्हां ॥ तों पुढें आला वृषपर्वा ॥ कपटकळा युद्धमावा ॥ नानाप्रकारें दावित ॥७४॥

तरी दशरथबाणसामर्थ्ये ॥ कापट्यविद्या न चले तेथें ॥ जैसें मूर्खाचें वाग्जाळ समस्त ॥ उच्छेदी पंडित एकशब्दें ॥७५॥

जैसा मंत्रवादी महामती ॥ त्यापुढें भूतचेष्टा न चालती ॥ तैशा दशरथापुढें युद्धगती ॥ कदा न चालती तयाच्या ॥७६॥

देखोनि शरथाचा प्रताप तेव्हां ॥ विरथ जाहला वृषपर्वा ॥ पाठी देऊनि तेधवां ॥ निघता जाहला सवेग ॥७७॥

घृतें शिंपिला वैश्र्वानर ॥ तैसा क्रोधायमान जाहला शुक्र ॥ रथीं बैसोनियां शर ॥ सोडिता जाहला प्रतापें ॥७८॥

जातेवेदास्त्र ते अवसरीं ॥ सोडिता जाहला देवांवरी ॥ अयोध्याधीशें झडकरी ॥ जलदास्त्र ते अवसरीं ॥

सोडिता जाहला देवांवरी ॥ अयोध्याधीशें झडकरी ॥ जलदास्त्र प्रेरिलें ॥७९॥

शुक्रें वातास्त्र सोडिलें अद्भुत ॥ येरें आड घातले पर्वत ॥ वात कोंडिला समस्त ॥ दैत्यगुरूनें देखिलें ॥८०

मग सोडिले वज्रास्त्र ॥ पर्वत फोडिले समग्र ॥ दशरथें सोडिलें माहेश्र्वर ॥ देखोनि वज्रास्त्र विरालें ॥८१॥

शुक्र परम क्रोधायमान ॥ काढिला एक निर्वाण बाण ॥ रथाचा आंख छेदून ॥ टाकिता जाहला तेधवां ॥८२॥

आंख छेदितां अकस्मात ॥ खालीं पडावा जों दशरथ ॥ तों कैकयी देखानि धांवत ॥ घालोनि हात आंख धरी ॥८३॥

पर्वताकार रथ थोर ॥ दंडावरी घेतला भार समग्र ॥ वीरश्रीरंगें नृपवर ॥ समाचार नेणे तो ॥८४॥

दशरथें सोडिला निर्वाणबाण ॥ तोडिला कवीचा स्यंदन ॥ अश्र्वांसहित कुटके करून ॥ रणमंडळीं पाडिला ॥८५॥

विरथजेव्हां जाहला शुक्र ॥ दशरथें काढिला सूर्यमुख शर ॥ म्हणे याचें छेदीन शिर ॥ कापट्यमुकुटा सहित पैं ॥८६॥

मागुतीं विचारी अजनंदन ॥ शुक्र तरी केवळ ब्राह्मण ॥ याचा रक्षोनियां प्राण ॥ मुकुटमात्र छेदावा ॥८७॥

निमिष न लागतां गेला बाण ॥ मुकुट पाडिला तळीं छेदून ॥ भयभीत भृगुनंदन ॥ पळता जाहला तेधवां ॥८८॥

देव करिती जयजयकार ॥ पळूं लागला दैत्यभार ॥ जैसा महावात सुटतां समग्र ॥ भूस उडे अंबरीं ॥८९॥

रायें कोदंडासी घातली गवसणी ॥ तूणीर ठेविला आवरण घालोनी ॥ जैसा कुंडामाजी दैदीप्य अग्नि ॥ आच्छादित याज्ञिक ॥९०॥

दशरथ पाहे सावधान ॥ कैकयीनें हात घालून ॥ धरिला असे महास्यंदन ॥ वर्तमान कळलें तें ॥९१॥

आश्र्चर्य करी नृपवर ॥ आजिचें युद्ध अनिवार ॥ आम्हांसी जयलाभ समग्र ॥ कैकयीनें दीधला ॥९२॥

जैसें घर पडतां अकस्मात ॥ निजबळें उचली बळवंत ॥ तैसा कैकयीनें आजि रथ ॥ सांवरिला रणांगणीं ॥९३॥

खालीं उतरून दशरथ ॥ प्रियेलागीं आलिंगित ॥ म्हणे दोन वर मागें त्वरित ॥ जे कां अपेक्षित मानसीं ॥९४॥

कैकयी आनंदली थोर ॥ म्हणे मी जेव्हां मागेन वर ॥ तेव्हां मज द्यावे साचार ॥ म्हणोनि भाष घेतली ॥९५॥

महायुद्धीं जय पूर्ण ॥ कैकयीस यावया काय कारण ॥ काय होतें तीस वरदान ॥ तेंचि कारण ऐक पां ॥९६॥

पितृगृही कैकयी असतां ॥ एक तापसी आला अवचितां ॥ तयासी प्रार्थोनियां माता ॥ राहविती जाहली कैकयीची ॥९७॥

ऋषि बैसला अनुष्ठानातें ॥ माता निरोपी कैकयीतें ॥ उपकरण सामग्री लागेल यातें ॥ ती सिद्ध करोनि देईंजे ॥९८॥

पुष्पें धूप दीप आरती ॥ सिद्ध करोनि देत ऋषीप्रति ॥ येरू प्राणायाम करूनि निश्र्चितीं ॥ ध्यानीं जाहला निमग्न ॥९९॥

तंव कैकयीनें घेऊनि मस ॥ लाविली ऋषीच्या मुखास ॥ ध्यान जाहलिया तो महापुरुष ॥ स्वमुख करें पुशीतसे ॥१००॥

तो हस्तास लागलें काळें ॥ कर्तृत्व कुमारीचें कळलें ॥ ऋषीनें शापिलें ते वेळे ॥ वदन काळें तुझें हो कां ॥१॥

तुजवरी अपेश येईल प्रचंड ॥ जगांत होईल काळें तोंड ॥ पुत्रद्वेष करिशील उदंड ॥ नसतें बंड वाढविशी ॥२॥

मातेनें समाचार ऐकोन ॥ वेगीं धरिले ऋृषीचें चरण ॥ स्वामी कैकयी बाळ अज्ञान ॥ नेणोनि कर्म हें केलें ॥३॥

कांहीं द्यावें जी वरदान ॥ मग ऋषि कृपाळु होऊन ॥ म्हणे संगा्रमीं पतीलागून ॥ जय देईल महारणीं ॥४॥

पूजासामुग्री दिधली समस्त ॥ तरी हा हस्त होईल यशवंत ॥ त्या वरें यासमयीं अद्भुत ॥ जय प्राप्त कैकयीतें ॥५॥

असों इंद्र आणि बृहस्पती ॥ दशरथाचें यश वानिती ॥ वस्त्रें भूषणें अमरपती ॥ देता झाला रायातें ॥६॥

वस्त्राभरणें अद्भुतें ॥ दिव्यमणि दीधला कैकयीतें ॥ येरीनें घातला वेणीतें ॥ परम प्रकाशवंत जो ॥७॥

तों देवआचार्य बोले वचन ॥ रायासी काय आहे पुत्रसंतान ॥ दशरथ म्हणे पुत्रवदन ॥ देखिलें नाहीं अद्यापि ॥८॥

सुरगुरु म्हणे राया वरिष्ठा ॥ त्रिभुवनपति येईल तुझिया पोटा ॥ ज्याचें ध्यान लागलें नीलकंठा ॥ सनकादिक भक्तांसी ॥९॥

जो मायाचक्रचाळक ॥ अनंत ब्रह्मांडांचा नायक ॥ जो कमलोद्भवाचा जनक ॥ तो पुत्र देख तुझा राया ॥११०॥

जो वेदशास्त्रांचा जिव्हार ॥ जो आदिमायेचा निजवर ॥ तो पुराणपुरुष अगोचर ॥ तुझा पुत्र होईल कीं ॥११॥

विभांढकाचा पुत्र श़ृंगऋषी ॥ हरणीगर्भसंभूत तेजोराशी ॥ त्यासी आणावें नानासायासीं ॥ पुत्रेष्टि करावया ॥१२॥

त्यास नाहीं मनुष्यदर्शन ॥ देखिलें नाहीं स्त्रियांचें वदन ॥ त्यास शब्दविषयें मोहून ॥ करोनि गायन आणावा ॥१३॥

शक्र म्हणे देवललना ॥ पाठवाव्या तया वना ॥ रंभा उर्वशी शुभानना ॥ ज्यांचे गायना मदन भुले ॥१४॥

दशरथें इंद्रगुरूची आज्ञा ॥ घेऊनी आला अयोध्याभुवना ॥ आनंद जाहला सकळ जनां ॥ पर्जन्यवृष्टि जाहली ॥१५॥

असंभाव्य पिकली मेदिनी ॥ दुष्काळ गेला मुळींहूनी ॥ जैसीं विष्णुसहस्रनामें करूनी ॥ महापापें संहारती ॥१६॥

इकडे वीणा टाळ मृदंग ॥ झल्लरी किंकिणी उपांग ॥ देवांगना घेऊन उपभोग ॥ वना सवेग चालल्या ॥१७॥

विभांडकऋषि तपोधन ॥ नित्य उषःकाळीं उठोन ॥ करावया जात अनुष्ठान ॥ जान्हवीतीराप्रति जाय ॥१८॥

मागें आश्रमीं एकला पुत्र ॥ उंच बांधोनियां गोपुर ॥ त्यावरी श़ृंगी तो परम चतुर ॥ वेदाध्ययन करितसे ॥१९॥

गज व्याघ्र सावजें बहुत ॥ देखतां होय भयभीत ॥ म्हणोनि उंच स्थळ बांधोनि सत्य ॥ त्यावरी सुत बैसविला ॥१२०॥

विभांडकऋषि अनुष्ठान करून ॥ दोन प्रहरां येत परतोन ॥ परमानंदें पुत्र देखोन ॥ अध्ययन सांगें तयातें ॥२१॥

चारही वेद मुखाद्रत ॥ सकळ शास्त्री पारंगत ॥ यागविधि कर्में समस्त ॥ करतलामलक तयातें ॥२२॥

असो विभांडक गेला स्नाना ॥ तो समय पाहोन देवांगना ॥ वेगीं पातला तया वना ॥ सर्व संपत्ति घेऊनियां ॥२३॥

वरी बैसला ऋषिनंदन ॥ तंव त्याणीं आरंभिलें गायन ॥ जें ऐकतां भुले पंचबाण ॥ स्वरूपलावण्य तयांचें ॥२४॥

जैशा केवळ सौदामिनी ॥ मंडित दिसती वस्त्राभरणीं ॥ ज्यांचीं स्वरूपें पाहोनी ॥ सुधापानी वेधले ॥२५॥

टाळ मृदंग सुस्वर ॥ गायन ऐकून ऋृषिपुत्र ॥ वरोनि पाहे सादर ॥ स्वरूप सुंदर न्याहाळोनी ॥२६॥

तंव नेत्रकटाक्ष हावभाव ॥ दाविती नानापरीचें लाघव ॥ श्रृंगीनें देखतांचि अपूर्व ॥ भय वाटे मानसीं ॥२७॥

गायन ऐकतां सुस्वर ॥ संतोष वाटे अपार ॥ म्हणे धरावया साचार ॥ पातले कोण न कळे हें ॥२८॥

भयेंकरून ते वेळां ॥ श्रृंगी वायुवेगें पळाला ॥ सवेंचि विलोकी परतोनि डोळां ॥ सुंदर स्वरूप तयांचे ॥२९॥

विभांडक अनुष्ठान करून ॥ आश्रमासी येत परतोन ॥ देवांगना जाती तेथोन ॥ शापभयें ऋषीच्या ॥१३०॥

म्हणती विभांडकासी कळेल ॥ तरी आम्हां तत्काळ शापील ॥ यालागीं दोन प्रहर होतां सकळ ॥ जाती वेगेंकरूनियां ॥३१॥

असो पिता आला आश्रमासी ॥ श्रृंगी सांगे तयापासीं ॥ म्हणे येथें आले होते तापसी ॥ उपमा ज्यांसी असेना ॥३२॥

मी तयांसी देखोनी ॥ पळालों देहलोभेंकरूनी ॥ आतां न ये ते दुसरेनी ॥ खंती मनीं वाटतसे ॥३३॥

विभांडक म्हणे पुत्रासी ॥ जरी आश्रमा आले संत ऋषी ॥ तरी आपण अतिथ्य करावें तयांशीं ॥ पूजाविधीकरूनियां ॥३४॥

असो प्रातःकाळीं विभांडकमुनी ॥ गेला अनुष्ठानालागुनी ॥ श्रृंगी चिंता करी मनीं ॥ म्हणे कधीं नयनी देखेन तयां ॥३५॥

विसरला लेखन पठण ॥ ज्ञान ध्यान आणि मनन ॥ लागलें मनीं स्त्रियांचें ध्यान ॥ अनर्थ पूर्ण स्त्रीसंगे ॥३६॥

ज्यानें स्त्री न देखिली स्वप्नीं ॥ त्यानें ती विलोकितां नयनीं ॥ गेला सर्व विसरोनी ॥ अनर्थ कामिनी तपासी ॥३७॥

मग ज्यांस अखंड स्त्रीचिंतन ॥ ते कैसे तरतील जन ॥ मूर्तिमंत भवाब्धि कामिन ॥ भुलवी सज्जन जाणते ॥३८॥

स्त्री केवळ अविद्येचा पसारा ॥ महाअनृत्या अविचारा ॥ सकळ असत्याचा थारा ॥ भय न धरी पापाचें ॥३९॥

स्त्री अनर्थाचें गृह सबळ ॥ कीं कलहाचें महामूळ ॥ कीं विषवल्लीच केवळ ॥ स्त्रीरूपें विस्तारली ॥१४०॥

स्त्री कामाची विशाळ दरी ॥ कीं ते क्रोधव्याघ्राची जाळी खरी ॥ कीं ते पापसमुद्रलहरी ॥ कीं ते भाजने असत्याचें ॥४१॥

कीं ते दुःखवृक्षाचें श्रेष्ठ फळ ॥ कीं ते मोहाचा पर्वत सबळ ॥ तें मत्सरवनचि केवळ ॥ किंवा भ्रांति अवतरली ॥४२॥

कीं दंभचि मूर्तिमंत विरूढला ॥ कीं अहंकार स्त्रीगड बांधिला ॥ कीं मूर्खत्व सकळ त्या स्थळा ॥ मिरास करूनि राहिलें ॥४३॥

कीं स्त्री मूर्तिमंत भवव्याधी ॥ कीं षडूर्मींची भरली नदी ॥ कीं सकळ विकारांची मांदी ॥ यात्रेसी आली त्या ठायां ॥४४॥

कवणें निर्मिली हे कुऱ्हाडी ॥ सबळ पुण्यवृक्ष तोडी ॥ कीं अविश्र्वासाची बेडी ॥ जिवाच्या पायीं ठोकिली ॥४५॥

कीं स्वर्गमोक्षअर्गळा सत्य ॥ दर्शनें पुरुषाचें चित्त चोरित ॥ स्पर्शबळें वीर्य हरित ॥ आसुरी प्रत्यक्ष कामिनी ॥४६॥

कौटिल्यदंभसंयुक्त ॥ क्षमाशौचविवर्जित ॥ महामंत्राचें सामर्थ्य ॥ क्षणें हरित न कळेचि ॥४७॥

गौडी माध्वी पैष्टी तीन्ही ॥ मदिरा ऐशा प्रकट जनीं ॥ चौथें मद्य तें कामिनी ॥ दुर्गंधी नाहाणी पापाची ॥४८॥

काय विद्या काय तप ॥ कायसें ध्यान काय जप ॥ कासया ज्ञान खटाटोप ॥ हरिलें सर्व स्त्रियांनीं ॥४९॥

जिव्हा दग्ध परान्नें पाहीं ॥ हस्त दग्ध प्रतिग्रहीं ॥ मग दग्ध स्त्रीचे ठायीं ॥ करूनि काय जप तप ॥१५०॥

व्यर्थ करिती पुरश्र्चरण ॥ स्त्रियेनें हरूनि नेलें मन ॥ करूं बैसतां जो ध्यान ॥ तों ध्यानीं चिंतन स्त्रियेचें ॥५१॥

काय अध्ययन काय कीर्तन ॥ व्यर्थ गेले पुराणश्रवण ॥ काय करूनि धर्म दान ॥ स्त्रियांनीं मन हरियेले ॥५२॥

स्त्री स्वरूपाची धरोन दिवी ॥ महानरकाची वाट दावी ॥ सज्ञानीयासही भुलवी ॥ वनीं हिंडवी विषयांचिया ॥५३॥

कीं काळें दूती पाठविली देखा ॥ चाळवूनि नेत महानरका ॥ दुराविलें मोक्षसुखा ॥ अधःपातीं पाडिलें ॥५४॥

आतां असो हा अनुवाद ॥ जरी कृपा करील ब्रह्मानंद ॥ तरीच तुटेल भवबंध ॥ हृदयीं बोध ठसावे ॥५५॥

जरी कृपा करील जगज्जीवन ॥ तरी हरिरूप दिसे जन वन ॥ कैचा पुरुष नपुंस कामिन ॥ व्यापिलें पूर्ण श्रीरामें ॥५६॥

नर नारी मिथ्याभास ॥ अवघा ओतला पुराणपुरुष ॥ जैं कृपा करील सर्वेश ॥ ब्रह्मानंद स्वामी पैं ॥५७॥

असो आतां श़ृंगीऋषी ॥ म्हणे कधीं येतील ते तापसी ॥ तों अकस्मात त्या समयासी ॥ रंभा ऊर्वशी पातल्या ॥५८॥

उत्तम स्वरूपें मंजुळ गायन ॥ सुंदर मुख आकर्णनयन ॥ श़ृंगीलागीं खुणावून ॥ कामभाव दाविती ॥५९॥

नानापक्वान्नें अमृतफळें ॥ श़ृंगीस देती बहु रसाळें ॥ मग तो उतरोनि खालें ॥ जवळी येवोनि बैसला ॥१६०॥

तयांसी पुसे आवडीकरून ॥ सांगा तुमचीं नामखूण ॥ हीं गलंडें काय म्हणोन ॥ वक्षःस्थहीं तूमच्या पैं ॥६१॥

येरी गदागदां हांसती ॥ तुझिया माथां श़ृंग निश्र्चिती ॥ म्हणोनि श़ृंगऋषि म्हणती ॥ तुजलागीं ऋषिपुत्रा ॥६२॥

आमचें नांव गलंडऋषि ॥ बहु सुख असे आम्हांपाशीं ॥ येरं म्हणे ते दाखवा आम्हांसी ॥ चवी कैसी पाहों पा ॥६३॥

त्या म्हणती जी तत्वतां ॥ कामासन तुज शिकवूं आतां ॥ तों मदनें मोहिलें ऋषिसुता ॥ आसक्त सुरतालागीं होय ॥६४॥

मग तो म्हणे मी तुम्हांधीन ॥ जिकडे न्याल तिकडे येईन ॥ मग त्यांनीं विमानीं बैसवून ॥ आणियेला अयोध्येसी ॥६५॥

दशरथें करूनि नमस्कार ॥ केला बहुत आदर ॥ म्हणे महाराज तुम्ही बहु थोर ॥ दर्शन आम्हां दीधलें ॥६६॥

मग पाळककन्या आपुली ॥ श़ृंगऋषीस दीधली ॥ लग्नसोहळा ते वेळीं ॥ चार दिवस जाहला ॥६७॥

मग ऋषि मेळविले बहुत ॥ जे शापानुग्रहसमर्थ ॥ वसिष्ठ मुख्य आचार्य जेथ ॥ न पडे पदार्थ न्यून कांहीं ॥६८॥

इकडे ज्ञानी पाहे विभांडकमुनी ॥ तों स्त्रियांनीं सुत नेला चाळवुनी ॥ परम क्रोधाविष्ट होऊनि ॥ अयोध्येसी पातला ॥६९॥

तों ऋषिवेष्टित देखिला कुमर ॥ जैसा नक्षत्रीं वेष्टिला रोहिणीवर ॥ कीं किरणीं वेष्टिला दिवाकर ॥ तैसा स्वसुत देखिला ॥१७०॥

स्नुषा देखोनि नयनीं ॥ विभांडक निवाला मनीं ॥ दशरथ लागला ऋषिचरणीं ॥ आनंदेंकरून तेधवां ॥७१॥

विभांडक आनंदें बहुत ॥ नृपासी आशीर्वाद देत ॥ तुज होतील चौघे सुत ॥ जे कां समर्थ त्रिभुवनीं ॥७२॥

असो यज्ञमंडपीं श़ृंगीं आपण ॥ सकळ ऋषिमंडळ घेऊन ॥ स्वाहाकारासी अवदान ॥ मंत्रयुक्त टाकित ॥७३॥

पूर्णाहुतीचिये काळीं ॥ प्रत्यक्ष प्रकटला ज्वाळामोळी ॥ जैसा सूर्य उगवे उदयाचळीं ॥ प्रातःकाळीं अकस्मात ॥७४॥

चत्वारिश़ृंग द्विमूर्धन ॥ सप्तपाणी त्रिचरण ॥ देखतां यज्ञनारायण ॥ ऋषिजन सुखावले ॥७५॥

हातीं पायसताट भरून ॥ श़ृंगीपाशीं देत कृशान ॥ म्हणे अविलंबें पिंड करून ॥ तिघी राणियांस देइंजे ॥७६॥

बहु त्वरा करावी ये क्षणीं ॥ विलंबें होय कार्यहानी ॥ पोटा येईल कैवल्यदानी ॥ क्षीरसागर विहारी जो ॥७७॥

ऐसें बोलोनि तये काळीं ॥ गुप्त जाहला ज्वाळामाळी ॥ श़ृंगीनें वसिष्ठाजवळी ॥ पायसपात्र दीधलें ॥७८॥

वसिष्ठें करूनि तीन विभाग ॥ राणियांस देत सवेग ॥ कौसल्येसी श्रेष्ठ भाग ॥ देता जाहला ऋषि तो ॥७९॥

दुजा सुमित्रेप्रति देत ॥ तिजा कैकयीकरीं घालित ॥ देखोनि ऐसें अद्भुत ॥ क्रोध आला कनिष्ठेते ॥१८०॥

म्हणे मी रायासी प्रियकर ॥ म्यां रथचक्रीं घालोनि कर ॥ रणीं विजयी केला नृपवर ॥ इंद्रादिक देवांदेखतां ॥८१॥

वयेंकरूनि वृद्ध फार ॥ ते ज्येष्ठ नव्हे साचार ॥ जियेमाजी गुण थोर ॥ तेच श्रेष्ठ जाणिजे ॥८२॥

केतकीचें लघु पत्र ॥ त्या मानिती सर्वत्र ॥ इतर पत्रें दिसती थोर ॥ परि चतुर न मानिती ॥८३॥

अमोलिक लहान रत्न ॥ काय करावे थोर पाषाण ॥ मृगेंद्राची आकृति लहान ॥ थोर वारण कासया ॥८४॥

जवादिबिडालांचें वृषण सुवास ॥ लहान परी आवडी श्रीमंतांस ॥ रासभाचें थोर बहुवस ॥ न शिवे कोणी तयांतें ॥८५॥

मज आधीं न देतां मान ॥ काय करावा भाग मागून ॥ म्हणोनि कैकयी रुसोन ॥ अधोवदन बैसली ॥८६॥

मग बोले वसिष्ठ मुनी ॥ विघ्न होईल येच क्षणी ॥ तों करींचा पिंड झडपोनी ॥ घारीनें नेला अकस्मात ॥८७॥

हाहाकार जाहला ते अवसरीं ॥ निमिष न लागतां गेला घारी ॥ कैकयी पडे धरणीवरी ॥ आक्रंदत तेधवां ॥८८॥

म्हणे माझें पूर्वकर्म गहन ॥ मज कैंचें पुत्रसंतान ॥ अभाग्यासी निधान ॥ जिरेल कोठून सांग पां ॥८९॥

परम चिंताक्रांत दशरथ ॥ कौसल्येकडे विलोकित ॥ मग कैकयीचें समाधान करीत ॥ पट्टमहिषी तेधवां ॥१९०॥

कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ अर्ध विभाग काढोनी ॥ देत्या जाहल्या ते क्षणीं ॥ पूर्ण पिंड कैकयीतें ॥९१॥

जैशा भागीरथी आणि मंदाकिनी ॥ तैशा कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ मत्सर अणुमात्र मनीं ॥ न करिती स्वप्नीं सर्वथा ॥९२॥

जे अत्यंत कुटिल देख ॥ तयांसि स्वप्नींही नाहीं सुख ॥ न कदां मानिती कोणी लोक ॥ सदा अपेशपात्र ते ॥९३॥

असो वसिष्ठें दीधलें तीर्थ ॥ तिघीही पिंड प्राशन करीत ॥ कैकयीच्या कंठीं पिंड अडकत ॥ कासाविस जाहली ते ॥९४॥

मग वसिष्ठें शिंपितां तीर्थ ॥ अंतरीं पिंड उतरत ॥ आनंदला राजा दशरथ ॥ दानें देत अपार ॥९५॥

वस्त्राभरणें उदंड दक्षिणा ॥ देवोनि गौरविलें ब्राह्मणां ॥ सकळ ऋषि पावले स्वस्थाना ॥ श़ृंगीआदिकरूननि ॥९६॥

तिघी राण्या जाहल्या गर्भस्थ ॥ आनंदला राजा दशरथ ॥ म्हणे माझे भाग्य उदित ॥ दिसतें पुढें येथोनी ॥९७॥

घारीनें जो पिंड झडपिला ॥ त्याचा वृत्तांत काय जाहला ॥ श्रोतयांनीं आक्षेप केला ॥ कथा समूळ सांगा पां ॥९८॥

तरी केसरीनामें वानर ॥ त्याची स्त्री अंजनी सुंदर ॥ ऋष्यमूकपर्वतीं घोर ॥ तप करीत बैसली ॥९९॥

सात सहस्र वर्षेपर्यंत ॥ मौन धरोनि शुचिष्मंत ॥ आराधिला उमाकांत ॥ प्रसन्न जाहला तपांतीं ॥२००॥

म्हणे अंजनी माग इच्छित ॥ येरी म्हणे देईं अक्षय सुत ॥ परम प्रतापी यशवंत ॥ महाभक्त वज्रदेही ॥१॥

मग बोले उमावर ॥ अकरावा जो मी महारुद्र ॥ तुझे उदरीं अक्षय अवतार ॥ धरितों अंजनी जाणपां ॥२॥

ऐकें शुभवदने अंजनी ॥ तूं अंजुळीपात्र पसरुनी ॥ बैसें सावध माझे ध्यानीं ॥ अंतर्द्दष्टि करूनियां ॥३॥

सुटेल अद्भुत प्रभंजन ॥ साक्षात लोकप्राणेश आपण ॥ प्रसाद देईल आणोन ॥ तो तूं भक्षी अविलंबें ॥४॥

स्वस्थळा गेला शूलापाणी ॥ ध्यानस्थ बैसली अंजनी ॥ नयन झांकोनि निजमनीं ॥ ब्रह्मानंदें उचंबळे ॥५॥

तंव कैकयीहातींचा पिंड झडपोनी ॥ घारी नेत असतां गगनीं ॥ तों चंडसमीरें ते क्षणीं ॥ पिंड मुखींचा आसुडिला ॥६॥

तो अंजनीच्या करांत ॥ आणोन घातला अकस्मात ॥ तो तत्काळ ती भक्षित ॥ शिवस्मरण करोनियां ॥७॥

घारी ते देवांगना वहिली ॥ नृत्य करितां चांचरी गेली ॥ मग विधीनें शापिली ॥ घारी होई म्हणोनी ॥८॥

मग ते सुवर्चसा नामें देवांगना ॥ लागे कमलोद्भवाचे चरणा ॥ विधि म्हणे दशरथ राणा ॥ अयोध्येचा नृपवर ॥९॥

त्याच्या मखसमयीं पिंड झडपितां ॥ उद्धरशील तूं तत्त्वतां ॥ अंजनीकरीं पिंड पडतां ॥ निजस्थाना येसी तूं ॥२१०॥

असो घारी ब्रह्मवरेंकरूनी ॥ उद्धरोनि पावली स्वस्थानीं ॥ इकडे नवमास भरतां अंजनी ॥ प्रसूत जाहली तेधवां ॥११॥

ऋृषिपत्न्या पाहती ते वेळां ॥ बळिया तो बाळ जन्मला ॥ कीं वासरमणी प्रगटला ॥ वानरवेषें दैदीप्य ॥१२॥

विद्युत्प्राय कुंडलें झळकती ॥ गंडस्थळीं पडली दीप्ती ॥ दृढ कौपीन निश्र्चिती ॥ कटीप्रदेशीं मौंजी झळके ॥१३॥

तळपतसे यज्ञोपवीत ॥ ऐसे वानररूप अद्भुत ॥ मुखीं पुच्छाग्रीं आरक्त ॥ वर्णं दिसत प्रवालसम ॥१४॥

क्षुधाक्रांत परम बाळ ॥ चहूंकडे पाहे चंचळ ॥ तों अंजनी उतावेळ ॥ फळें गेली आणावया ॥१५॥

रुदन करी क्षुधित बाळ ॥ आरक्त दिसे सूर्यमंडळ ॥ म्हणे हें दिसे उत्तम फळ ॥ उडे चपळ मारुती ॥१६॥

पिंजारल्या रोमावळी ॥ सिंहनादें गर्जे निराळीं ॥ दिग्गजांचीं बैसलीं टाळीं ॥ आंदोळली वसुंधरा ॥१७॥

स्फुरण दाटलें थोर ॥ गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ मागें आंगवातें तरुवर ॥ उन्माळोनि जाती आकाशीं ॥१८॥

चपळ पदद्वय तसेच हस्त ॥ प्रतापें झेंपावे गगनांत ॥ उड्डाणावर उड्डाण घेत ॥ जात आदित्यं लक्षोनीयां ॥१९॥

कीं उर्वींवरोनी सुपर्ण ॥ जाय वैकुंठपीठ लक्षून ॥ तैंसाचि अंजनीहृदयरत्न ॥ भानुमंडळा आटोपी ॥२२०॥

मनोवेगासी मागें टाकुनी ॥ हनुमंत वेगें जात गगनीं ॥ तों लोकप्राणेश धांवुनी ॥ धरीन म्हणे स्वपुत्रा ॥२१॥

परम तीव्र सूर्यमंडळ ॥ तेजें आहाळेल माझें बाळ ॥ म्हणून धरूं पाहे अनिळ ॥ परी तो चपळ नाटोपे ॥२२॥

मग हिमाचलाचे शीतलांबुकण ॥ मागून शिंपी प्रभंजन ॥ हनुमंत मुख पसरोन ॥ सूर्याजवळी पातला ॥२३॥

तों ते दिवशीं सूर्यग्रहण ॥ राहू आला मुख पसरोन ॥ मारुतीस क्रोध आला दारुण ॥ सिंहिकासुत देखतां ॥२४॥

म्हणे मी अत्यंत क्षुधित ॥ फळ भक्षावया आलों येथ ॥ हा कोण आला अकस्मात ॥ ग्रासाआड माझिया ॥२५॥

सबळ पुच्छघायेंकरून ॥ फोडिले राहूचें वदन ॥ भिरकाविला पायीं धरून ॥ मूर्च्छा येऊन पडला तो ॥२६॥

जैसा शुंडादंडेकरून देख ॥ महागज विदारी बिडालक ॥ कीं भुजंगाचे कवेंत मूषक ॥ अकस्मात सांपडला ॥२७॥

राहूचे कैवारें केत ॥ कपीवरी धांवला उन्मत्त ॥ जैसा केसरीपुढें जंबुक येत ॥ आपलें मरण विसरूनियां ॥२८॥

केतु देखतांचि हनुमंतें ॥ तेथेंचि मर्दिला मुष्टिघातें ॥ आंग चुकवोनि वेगें बहुतें ॥ पळता जाहला केतु पैं ॥२९॥

राहु आणि केत ॥ इंद्रापाशी आले धांवत ॥ अशुद्धें नाहालें जेंवीं पर्वत ॥ सिंदूरेंकरून माखलें ॥२३०॥

आक्रोशें बोलती दोघेजण ॥ तूं सुरेश सहस्रनयन ॥ आम्हांवरी कोप धरून ॥ हें कां विघ्न धाडिलें ॥३१॥

नवा पुच्छराहु करून ॥ आम्हांवरी दीधला पाठवून ॥ आश्र्चर्य करी शचीरमण ॥ म्हणे हें कर्तृत्व कोणाचें ॥३२॥

कोणी केली विपरीत करणी ॥ त्यास संहारावया वज्रपाणी ॥ त्रिदशसमुदाय घेऊनी ॥ वायुवेगें धांविन्नला ॥३३॥

राहु पुढें पुढें धांवत ॥ मागें देवांसहित अमरनाथ ॥ तों इकडे अंजनीसुत ॥ सूर्य ग्रासूं धांवतसे ॥३४॥

चळाचळां कांपे मित्र ॥ म्हणे कैंचा आला हा अमित्र ॥ दिनमान सांडोनि दिनकर ॥ पळों न लाहे सर्वथा ॥३५॥

प्रतापरुद्र मारुती ॥ सूर्यमंडळ धरिलें हातीं ॥ हें फळ नव्हे निश्र्चिती ॥ म्हणोनि पुढती टाकिलें ॥३६॥

जैसा केवळ वडवानळ ॥ तैसेंच दैदीप्यमान सूर्यमंडळ ॥ फळ नव्हे म्हणोनि अंजनीबाळ ॥ टाकिता जाहला पूढती पैं ॥३७॥

माघारा पाहे परतोन ॥ तो राहु आला शक्रास घेऊन ॥ पुढती क्रोध आला दारुण ॥ म्हणे आतां न सोडीं यासी ॥३८॥

साह्य करू अमरपती ॥ मजवरी आला पुढती ॥ जैसे शलभ मिळूनि येती ॥ कल्पांतविजू धरावया ॥३९॥

ऐसें बोलत वायुनंदन ॥ राहुवरी लोटला येऊन ॥ इंद्रादेखतां ताडण ॥ राहुसी केलें बहुसाल ॥२४०॥

जैसा पर्वत पडे अकस्मात ॥ तैसा राहुसी दे मुष्टिघात ॥ ग्रहपूजा यथासांग तेथ ॥ वायुसुतें मांडिली ॥४१॥

राहु आक्रोशें फोडी हांका ॥ म्हणे काय पाहसी अमरनायका ॥ शक्रें ऐरावती देखा ॥ अकस्मात प्ररिला ॥४२॥

जिकडे धांवे ऐरावत ॥ तिकडे भारें उर्वीं लवत ॥ कीं दुसरा मेरु मुर्तिमंत ॥ शक्राचें वाहन जाहला ॥४३॥

तो सबळ लोटला ऐरावती ॥ चपळ धांवला वीर मारुती ॥ जैसा वज्रघात पर्वतीं ॥ तैसा कुंभस्थळीं ताडिला ॥४४॥

धाकें ऐरावत तो पळे ॥ पाकशासन निजबळें ॥ ऐरावत आकळितां नाकळे ॥ रान घेतलें भयेंचि ॥४५॥

जैसी दुर्बळाची स्त्री नष्ट बहुत ॥ ती न मानी त्याचा वचनार्थ ॥ तैसा इंद्रासी ऐरावत ॥ नाटोपेचि सर्वथा ॥४६॥

असो विवेक करूनि बहुत ॥ काम क्रोध आवरिती महंत ॥ तैसा सहस्राक्षें ऐरावत ॥ पुढती समोर आणिला ॥४७॥

मागुता धांवे पवनसुत ॥ धरी ऐरावताचे चारही दंत ॥ उलथोनि खालीं पाडित ॥ शक्रासहित तेधवां ॥४८॥

हस्तचपेटें हनुमंतें ते वेळी ॥ किरीट शक्राचा पाडिला भूतळीं ॥ सकळ देवसेना ते काळीं ॥ भयभीत जाहली ॥४९॥

इंद्राची झोटी मोकळी ॥ मागुती ऐरावत आकळी ॥ हनुमंतावरी बळेंचि घाली ॥ गज न घाली पाऊल पुढें ॥२५०॥

गज पळे रानोरान ॥ परम घाबरला सहस्रनयन ॥ तों यम हस्तीं दंड घेऊन ॥ हनुमंतावरी धांविन्नला ॥५१॥

यमें दंड प्रेरावा जों ते वेळां ॥ तो मारुती अंगावरी कोसळला ॥ मुष्टिघात हृदयीं दीधला ॥ यम पाडिला धरणीवरी ॥५२॥

वक्षःस्थळीं वळंघोनि हनुमंत ॥ पुढती मुष्टिघ्ज्ञात प्रेरित ॥ हातींचा दंड हिरोनि घेत ॥ तेणेंचि ताडित तयासी ॥५३॥

यमें धरिले मारुतीचे चरण ॥ म्हणे मी तुजला अनन्य शरण ॥ हस्त जोडूनियां वरुण ॥ स्तुति करीत मारुतीची ॥५४॥

कुबेर धांवोन ते समयीं ॥ लागे हनुमंताचे पायीं ॥ तों ऐरावतारूढ लवलाहीं ॥ शक्र वेगें पातला ॥५५॥

ऐसें देखोनि ते अवसरीं ॥ मारुती धांवे शचीवरावरी ॥ ऐरावतसीस पुच्छीं धरी ॥ पृथ्वीवरी आपटावया ॥५६॥

पुच्छ धरूनि भोवंडीं गज ॥ पृथ्वीसहित कांपती दिग्गज ॥ अवनीवरी देवराज ॥ वज्रासह पाडिला ॥५७॥

बळें गज आपटिला धरणीं ॥ देवांस मांडली महापळणी ॥ कडे कपाटीं जाउनी ॥ महायोद्धे दडाले ॥५८॥

म्हणती पृथ्वी गेली रसातळा ॥ एकचि हाहाकार जाहला ॥ तो अमरेंद्रें ते वेळां ॥ आव धरिला पुढती पैं ॥५९॥

वज्र बळें भोंवंडित ॥ मुखावरी ताडिला हनुमंत ॥ तेणें मूर्च्छना दाटली बहुत ॥ पडे वायुसुत पृथ्वीवरी ॥२६०॥

कनकाद्रीवरून कोसळला ॥ पर्वतदरीमाजी पडला ॥ लोकप्राणेश धांविन्नला ॥ सुत धरिला पोटासी ॥६१॥

कासाविस वायुनंदन ॥ विकळ पडला अचेतन ॥ वायु रडे स्फुंदस्फुंदोन ॥ पुढें घेऊन हनुमंता ॥६२॥

म्हो दुर्जन हा अमरेंद्र ॥ तान्हयावरी घातलें वज्र ॥ परम निर्दय पुरंदर ॥ करीन संहार तयाचा ॥६३॥

माझिया तान्हयाचा जातां प्राण ॥ आटीन सकळ त्रिभुवन ॥ जैसे प्रल्हादाकारणें दैत्य संपूर्ण ॥ श्रीनृसिंहें आटिले ॥६४॥

वायुआधीन सकळांचे प्राण ॥ आकर्षिले न लागतां क्षण श्र्वासोच्छ्वास कोंडून ॥ केलें त्रिभुवन कासाविस ॥६५॥

मग इंद्र विरिंचि सकळ सुरवर ॥ रमावर आणि उमावर ॥ सकळ प्रजा ऋृषीश्र्वर ॥ शरण आले वायूतें ॥६६॥

पोटासी धरूनि हनुमंत ॥ वायु दीर्घस्वरें रडत ॥ तों ब्रह्मादिदेव समस्त ॥ प्राणनाथें देखिले ॥६७॥

हनुमंत कडेवरी घेउनी ॥ वायु उभा राहे ते क्षणीं ॥ तिन्ही देव देखानि नयनीं ॥ नमस्कार करी तेधवां ॥६८॥

मग बोले कमळासन ॥ पुत्राचा कैवार घेऊन ॥ अवघे जन निर्दाळून ॥ टाकिशी काय प्राणेशा ॥६९॥

येरू म्हणे न उठतां माझा सुत ॥ इंद्रासीं आटीन देवांसहित ॥ ऐकोनि हांसे इंदिरानाथ ॥ वर देतसे संतोषोनी ॥२७०॥

पूर्ण पिंडाचा हनुमंत ॥ यासी स्वप्नींही नाहीं मृत्य ॥ ब्रह्मकल्पपर्यंत ॥ चिरंजीव पुत्र तुझा ॥७१॥

मग बोले कर्पूरगौर ॥ माझिये तृतीय नेत्रींचा वैश्र्वानर ॥ क्षणें जाळील चराचर ॥ परी यासी बाधे ना ॥७२॥

माझी त्रिशूळादि आयुधें तत्त्वतां ॥ तीं न रुतती हनुमंता ॥ मग विरिंचि होय बोलता ॥ निजवरदान ऐका तें ॥७३॥

माझें ब्रह्मास्त्र आणि पाश ॥ कदा न बाधितील यास ॥ म्यां जीं शस्त्रें निर्मिलीं बहुवस ॥ तींही यास न बाधितीं ॥७४॥

मग इंद्रही वदे सवेग वर ॥ माझें यासी बाधे वज्र ॥ हा वज्रदेही साचार ॥ अक्षय अभंग सर्वदा ॥७५॥

हनुवटीस झगडलें वज्र ॥ यास हनुमंत नाम साचार ॥ कुबेर म्हणे बहुत असुर ॥ क्षय पावती हस्तें याच्या ॥७६॥

मग वदे वरदान ॥ यास काळदंड न बाधी पूर्ण ॥ याचे करिती जे नामस्मरण ॥ त्यांसी बंधन न करीं मी ॥७७॥

मग बोले रसाधिपति ॥ अभंग असो यास शक्ति ॥ कधीं श्रम न पावे मारुती ॥ युद्ध करितां बहुसाल ॥७८॥

दिव्य कमळांची सुमनमाळ ॥ न सुके लोटतां बहुकाळ ॥ ती विश्र्वकर्में तात्काळ ॥ गळां घातली मारुतीच्या ॥७९॥

समस्तीं देऊन वरदाना ॥ गेले आपुले स्वस्थाना ॥ वायूनें हनुमंत तें क्षणा अंजनीजवळ अणिला ॥२८०॥

मारुतीस हृदयीं धरोनि ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे जननी ॥ मुखामाजी स्तन घालुनी । वदन कुरवाळी वेळोवेळां ॥८१॥

रामविजय ग्रंथ सुरस ॥ त्यामाजी हनुमंतजन्म विशेष ॥ श्रवण करिती जे सावकाश ॥ ग्रहपीडा त्यांस न होय ॥८२॥

हनुमंतजन्मकथन ॥ निजभावें करितां श्रवण ॥ दुष्ट ग्रहविघ्नें दारुण ॥ न बाधिती कदाही ॥८३॥

पुढें रसाळ कथा बहुत ॥ डोहळे पुसेल राजा दशरथ ॥ अजन्मा जन्मेल रघुनाथ ॥ तोच कथार्थ अवधारा ॥८४॥

जैसें जों जों क्षेत्र पिकत ॥ तों तों कणसें घनदाट दिसत ॥ तैसे प्रसंगाहून प्रसंग बहुत ॥ रसभरित असती पैं ॥८५॥

जयासी नाहीं पुत्रसंतान ॥ त्यानें करावें विजयावर्तन ॥ संतति संपत्ति परिपूर्ण ॥ सदा नांदती त्याचे गृहीं ॥८६॥

येथोनि श्रीरामचरित्रकथा गहन ॥ श्रोतीं परिसावी सावधान ॥ तेणें ब्रह्मानंद ठसावोन ॥ कैवल्यपद पाविजे ॥८७॥

ब्रह्मानंदा श्रीरघुवीरा ॥ विषकंठहृदया परात्परा ॥ वेदवंद्या श्रीधरवरा ॥ दीनोद्धारा जगद्रुरो ॥८८॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ तृतीयाध्याय गोड हा ॥२८९॥

श्रीरामसमर्थ

श्रीरामविजयअध्याय था

चतुर श्रोते करिती प्रश्र्न ॥ तृतीयाध्यायीं हनुमंतजनन ॥ सांगितलें तुवां संपूर्ण ॥ कथा अद्भुत नवलचि ॥१॥

आणिके पुराणीं साचार ॥ हनुमंतजन्मकथाप्रकार ॥ वेगळाचि असे विचार ॥ पृथक् कथियेला ॥२॥

तरी पुराणांतरी विपरीत ॥ कथा पडावया काय निमित्त ॥ याचें प्रत्युत्तर यथार्थ ॥ सांग समस्तां कळावया ॥३॥

ऐसें श्रोतयांचें वाग्जाळ ॥ परिसोनियां कवि कुशळ ॥ शब्द बोले अति रसाळ ॥ परिसा सकळ श्रोते हो ॥४॥

अनादिसिद्ध अवतारमाळा ॥ जगदीशें गुंफिल्या अवलीळा ॥ जैसें तरंगापूर्वीं जळा ॥ व्यापोनियां असणें कीं ॥५॥

जैशी रहाटघटमाळिका ॥ तेंविं हें अवतारचरित्र देखा ॥ कीं भगणें मित्र मृगांका ॥ प्रदक्षिणा करणें मेरूची ॥६॥

कीं जपमाळेचे मणी ॥ तेचि येती परतोनि ॥ तैसे अवतार ब्रह्मांडभुवनीं ॥ फिरती माळेसारिखे ॥७॥

तरी कल्पपरत्वें अवतार ॥ जे जे वेळे जें जें चरित्र ॥ तैसेंचि बोलिला सत्यवतीकुमर ॥ कथा साचार तितुक्याही ॥८॥

एके अवतारीं वर्तलें एक ॥ तों दुसरे अवतारीं विशेष कौतुक ॥ तरी तितुकेंही सत्य देख ॥ विपरीतार्थ न मानिजे ॥९॥

रणामाजी एकांग वीर ॥ तैसा जाणिजे कवीश्र्वर ॥ बहुत श्रोतयांचे भार ॥ परम चतुरसागर जे ॥१०॥

सभानायक प्रवीण अत्यंत ॥ करीं संदेहधनुष्य घेत ॥ प्रश्र्नावर शर सोडित ॥ आशंकासमय लक्षोनियां ॥११॥

मग कवीनें धैर्यठान मांडून ॥ चढविलें स्फूर्तीचें शरासन ॥ शास्त्रसंमताचे बाण ॥ सोडी अभंग अनिवार ॥१२॥

सत्त्व ओढी काढूनि सत्वर ॥ क्षमावेशें सोडी शर ॥ परम कौशल्यें साचार ॥ प्रश्र्नबाण छेदित ॥१३॥

श्रोत्यावक्त्यांचें संधान ॥ तटस्थ पाहती विचक्षण ॥ धन्य धन्य रे म्हणोन ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥१४॥

आवेशा चढले दोघेजण ॥ सप्रेम करित नामस्मरण ॥ तो घनघोष ऐकून ॥ आशंकाश्र्वापदें दूर पळती ॥१५

वक्त्यांचे वाग्बाण अत्यंत ॥ अर्थगौरवमुख लखलखित ॥ पद्यरचना पक्षमंडित ॥ सुरंग मिरवत साहित्य ॥१६॥

ऐसे शर सुटतां अपार ॥ भेदलें श्रोतयांचें अंतर ॥ डोलविलें तेणें शिर ॥ सुखोर्मीचेनिभरें पैं ॥१७॥

वैरभाव नसतां किंचित ॥ हें आनंदाचें युद्ध होत ॥ क्षीराब्धीच्या लहरी मिळत ॥ जैशा एकमेकांसी ॥१८॥

निष्कपट श्रोता पुसत ॥ निरभिमान वक्ता बोलत ॥ शब्दकौशल्य युद्ध सत्य ॥ जाणती पंडित विवेकी ॥१९॥

देवभक्तांचा अनुवाद ॥ तेथें काय आहे वैरसंबंध ॥ कीं गुरुशिष्यांचा संवाद ॥ आनंदयुक्त शब्दांचा ॥२०॥

असोत ह्या बहुत युक्ती ॥ चातुर्यसिंधुमंथनपद्धती ॥ वर्म जाणिजे पंडितीं ॥ चातुर्यरीती कळा ज्या ॥२१॥

कवीची घडामोडी बहूत ॥ युक्तिसागरींचीं रत्नें काढित ॥ एक गव्हांचे प्रकार बहुत ॥ करी जैसी सुगरिणी ॥२२॥

एके मृत्तिकेचे घट अपार ॥ एका तंतूचे पट विचित्र ॥ एक हेम बहुत अलंकार ॥ हाटकघडणार करी जैसा ॥२३॥

एके काष्ठीं शिल्पकार ॥ युक्ति दाखवी अपार ॥ जैसा जो कवि चतुर ॥ शब्दसाहित्य विवरी पैं ॥२४॥

असो हें चातुर्यं कारणें ॥ बोलावें लागलें श्रोतियांकारणें ॥ पुढें रघुनाथकथा परिसणें ॥ श्रीधर चतुरां विनवीतसे ॥२५॥

मागील कथानुसंधान ॥ तृतीयाध्यायीं निरूपण ॥ सांगितलें हनुमंतजन्मकथन ॥ मूळग्रंथआधारें ॥२६॥

सिंहावलोकनें तत्वतां ॥ श्रोतीं परिसिजे मागील कथा ॥ तिघी राण्या जाहल्या गर्भस्था ॥ कौसल्या सुमित्रा कैकयी ॥२७॥

जैसा शुद्ध बिजेचा मृगांक ॥ दिवसेंदिवस कळा अधिक ॥ कीं पळोपळीं चढे अर्क ॥ उदयाद्रीहूनि पश्र्चिमे ॥२८॥

कीं करितां संतसमागम ॥ दिवसेंदिवस वाढे प्रेम ॥ कीं औदार्येंकरूनि परम ॥ किर्ति वाढे सत्वर ॥२९॥

तैसे राणियांचे गर्भ वाढती ॥ तों वसिष्ठ बोले दशरथाप्रति ॥ राया धर्मशास्त्रीं ऐशी रीति ॥ डोहळे स्त्रियांसी पुसावे ॥३०॥

ऐसें बोलतां ब्रह्मऋृषि ॥ हर्ष वाटला रायासी ॥ नमोनि वसिष्ठचरणांसी ॥ राजेंद्र तेव्हां चालिला ॥३१॥

जैसा शचीचिया मंदिरांत ॥ वृत्रासुरशत्रु प्रवेशत ॥ तैसाचि अजपाळसुत ॥ कैकयीसदनीं प्रवेशे ॥३२॥

पिंडप्राशनाचे काळीं ॥ कैकयी होती रुसली ॥ म्हणोनि राजेंद्र ते वेळीं ॥ तिचे सदनीं प्रवेशला ॥३३॥

दूती जाणविती स्वामिनीतें ॥ डोहळे पुसावया तुम्हांतें ॥ नृपती स्वयें येतसे येथें ॥ सुमुहूर्त पाहोनियां ॥३४॥

सुंदरपणाचा अभिमान ॥ त्याहीवरी कैकयी गर्भिण ॥ जैसी अल्पविद्या गर्व पूर्ण ॥ तैसें येथें जाहलें ॥३५॥

जैसी गारुडीयांची विद्या किंचित ॥ परी ब्रीद्रें बांधिती बहुत ॥ कीं निर्नासिक वाहत ॥ रूपाभिमान विशेष पैं ॥३६॥

बिंदुमात्र विष वृश्र्चिका ॥ परी पुच्छाग्र सदा वरुतें देखा ॥ किंचित ज्ञान होतां महामूर्खा ॥ मग तो न गणी वाचस्पतीतें ॥३७॥

खडाणे धेनूसी दुग्ध किंचित ॥ परी लत्ताप्रहार दे बहुत ॥ अल्पोदकें घट उचंबळत ॥ अंग भिजत वाहकाचें ॥३८॥

तैसें कैकयीस जाहलें तये वेळीं ॥ प्रीतीनें दशरथ आला जवळी ॥ आपण सेजेवरी निजली ॥ नाहीं धरिली मर्यादा ॥३९॥

स्त्री सेवक अपत्य दासी ॥ श्र्वान मर्कट कूरूपियासी ॥ मर्यादा तुटतां मग सकळांसी ॥ ते अनिवार जाणिजे ॥४०॥

म्हणोनि मर्यादा कांहीं तेथ ॥ कैकयी न धरी देखतां दशरथ ॥ तिसी डोहळे पुसे नृपनाथ ॥ उभा समीप राहोनि ॥४१॥

म्हणे कैकयी बोले वचन ॥ तुज जें आवडे मनांतून ॥ तें मी समस्त पुरवीन ॥ सत्य जाण प्रियकरे ॥४२॥

मग काय बोले ते वेळे ॥ तुम्ही काय पुरवाल डोहळे ॥ माझे मनींचे सोहळे ॥ पूर्णकर्ता दिसेना ॥४३॥

मग बोले अजनंदन ॥ तुजकारणें वेंचीन प्राण ॥ परी तुझे डोहळे पुरवीन ॥ सत्य जाण सुकुमारे ॥४४॥

मग ती म्हणे जी नृपवरा ॥ डोहळे हेचि माझे अवधारा ॥ कौसल्या सुमित्रेचिया कुमरां ॥ दिगंतरा दवडावें ॥४५॥

पाठवावे दूर कानना ॥ त्यांचा समाचार पुनः कळेना ॥ आमचें वर्तमान त्यांचिया कर्णा ॥ सहसाहि न जावें ॥४६॥

राज्य द्यावें माझियां पुत्रा ॥ हेचि डोहळे होती राजेंद्रा ॥ तुम्ही म्हणाल अधर्म खरा ॥ तरी तो दोष मजवरी घालिजे ॥४७॥

मज निंदतील सकळ लोक ॥ तों तों वाटेल परम सुख ॥ समस्त जनां व्हावें दुःख ॥ हेंचि मजला आवडे ॥४८॥

ऐसें कैकयी वदे ते अवसरीं ॥ ऐकतां नृप खोंचला अंतरीं ॥ कीं काळिजी घातली सुरी ॥ कीं अंगावरी चपळा पडे ॥४९॥

वचन नव्हे तें केवळ ॥ दुःखवल्लीचें श्रेष्ठ फळ ॥ कीं संचरलें हाळाहाळ ॥ हृदयीं वाटे दशरथा ॥५०॥

वाटे पर्वत कोसळला ॥ कीं काळसर्प जिव्हारी झोंबला ॥ कीं तप्तशस्त्रघाय पडला ॥ अंगावरी अकस्मात ॥५१॥

कैकयीवचन कलशोद्भव पूर्ण ॥ प्राशिलें आसुष्यसागरजीवन ॥ राव घाबरा होय जैसा चतुरानन ॥ वेद हरण केले जेव्हां ॥५२॥

परम खेद पावला नृपवर ॥ तीस नेदीच प्रत्युत्तर ॥ मग सुमित्रेचें मंदिर ॥ प्रवेशता जाहला ॥५३॥

संसारतापें जे संतप्त ॥ ते संतसमागमें जैसे निवत ॥ तैसाचि राजा दशरथ ॥ सुमित्रासदनीं सुखावला ॥५४॥

तिचें नाम सुमित्रा सती ॥ परी नामाऐशीच आहे रीति ॥ वरकड नांवें जीं ठेविती ॥ तीं तों व्यर्थचि जाणिजे ॥५५॥

नांव ठेविलें उदार कर्ण ॥ आडका वेचितां जाय प्राण ॥ बृहस्पति नाम ज्यालागून । धड वचन बोलतां न ये ॥५६॥

कमलनयन नाम विशेष ॥ परी दोहीं डोळ्यां वाढले वडस ॥ क्षीरसिंधु नाम पुत्रास ॥ परि तक्र तयासी मिळेना ॥५७॥

नांव ठेविले पंचानन ॥ परी जंबुक देखतां पळे उठोन ॥ जन्म गेला मानतां कोरान्न ॥ सार्वभौम नाम तयातें ॥५८॥

नाम ठेविले जया मदन ॥ तो निर्नासिक कुलक्षण ॥ तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण ॥ करणी नामासारखी ॥५९॥

नृप आला एकतां कर्णीं ॥ समोर आली हंसगामिनी ॥ दशरथाचिये चरणीं ॥ मस्तक ठेवी सद्भावें ॥६०॥

स्त्रियांस देव तो आपुला नाथ ॥ पुत्रांसी माता पिता सत्य ॥ शिष्यासी गुरु दैवत ॥ गृहस्थासी दैवत अतिथी पैं ॥६१॥

म्हणोन सुमित्रेनें अजनंदन ॥ पूजिला षोडशोपचारेंकरून ॥ उभी ठाकली कर जोडून ॥ अधोवदन सलज्ज ॥६२॥

कैकयीडोहळ्यांचें दुःख प्रबळ ॥ राव विसरला हो सकळ ॥ जैसा बोध ठसावतां निर्मळ ॥ तमजाळ वितुळे पैं ॥६३॥

राजा म्हणे सुमित्रेशीं ॥ काय डोहळे होताती मानसीं ॥ ते मज सांग निश्र्चयेंसीं ॥ कुरंगनेत्रे सुमित्रे ॥६४॥

मग किंचित हास्य करून ॥ बोले सलज्ज अधोवदन ॥ जें ऐकतां सुखसंपन्न ॥ अजनंदन होय पैं ॥६५॥

म्हणे हेच आवडी बहुवस ॥ कौसल्यागर्भीं जगन्निवास ॥ अवतरेल जो आदिपुरुष ॥ जगद्वंद्य जगदात्मा ॥६६॥

त्याची अहोरात्र सेवा बरवी ॥ वाटे मम पुत्रेंचि करावी ॥ जाणीव शहाणीव आघवी ॥ ओंवाळावी तयावरूनि ॥६७॥

सेवेपरतें थोर साधन । मम पुत्रासी न माने आन ॥ आपुले अंगाचें आंथरुण ॥ ज्येष्ठसेवनालागीं करूं ॥६८॥

त्रिभुवनराज्य तृणासमान ॥ त्याहूनि अधिक ज्येष्ठ भजन ॥ चारी मुक्ति वाटती गौण ॥ ज्येष्ठसेवेपुढें पैं ॥६९॥

सुधारस त्यजोनि निर्मळ ॥ कोणास आवडेल हाळाहळ ॥ उत्तम सांडूनि तांदुळ ॥ सिकता कांहो शिजवावी ॥७०॥

त्योजोनि सुंदर रायकेळे ॥ कोण भक्षील अर्कफळें ॥ कल्दद्रुमीं जो विहंगम खेळे ॥ तो नातळे बाभुळेसी ॥७१॥

मानससरोवरींचा हंस पाहीं ॥ तो कदा न राहे उलूकगृहीं ॥ बुडी दीधली क्षीराब्धिडोहीं ॥ दग्ध वन नावडे तया ॥७२॥

नंदनवनींचा भ्रमर कदाकाळीं ॥ अर्कपुष्पीं रुंजी न घाली ॥ जेणें इंद्रभवनीं निद्रा केली ॥ खदिरांगारीं न निजे तो ॥७३॥

रंभेतुल्य जाया चांगली ॥ सांडोनि प्रेत कोण कवळी ॥ तैसी भजनीं आवडी धरिली ॥ कदा विषयीं न रमे तो ॥७४॥

म्हणोनि चक्रचूडामणी ॥ माझी आवडी ज्येष्ठभजनीं ॥ ऐसें सुमित्रेचे शब्द कर्णी ॥ आकर्णिले दशरथें ॥७५॥

वाटे अमृत प्राशन केलें ॥ कीं त्रिभुवनराज्य हातासी आलें ॥ तैसें नृपाचें मन संतोषलें ॥ आलिंगिलें सुमित्रेसी ॥७६॥

म्हणे ऐक सुकुमार राजसे ॥ चंपककळिके परम डोळसे ॥ तुवां डोहळे इच्छिले जे मानसें ॥ ते मी सर्वस्वें पुरवीन ॥७७॥

नानाभूषणें अलंकार ॥ ओंवाळी तिजवरूनि नृपवर ॥ दानें देवविलीं अपार ॥ सुमित्रेहातीं याचकां ॥७८॥

याउपरी ज्येष्ठ राणी ॥ कौसल्या नामें ज्ञानखाणी ॥ जे पुराणपुरुषाची जननी ॥ ख्याति त्रिभुवनीं जियेची ॥७९॥

जे परब्रह्मरसाची मूस ॥ की निजप्रकाशरत्नमांदुस ॥ क्षीराब्धिहृदयविलास ॥ जिनें अंतरीं सांठविला ॥८०॥

जो इंदिरावर त्रिभुवनेश्र्वर ॥ ज्याचे आज्ञाधारक विधी शचीवर ॥ हृदयीं ध्यान अपर्णावर ॥ कौसल्याउदरनिवासी तो ॥८१॥

असो कौसल्येचे मंदिरीं ॥ प्रवेशता जाहला श्रावणारी ॥ सेवक राहविले बाहेरी ॥ द्वारमर्यादा धरोनियां ॥८२॥

कौसल्या ज्ञानकळा परम ॥ तीस अंतर्बाह्य व्यापला राम ॥ चराचर अवघे परब्रह्म ॥ न दिसे विषम कदाहि ॥८३॥

सांडोनि जागृति सुषुप्ति स्वप्न ॥ नयनीं ल्याली ज्ञानांजन ॥ चराचर अवघें निरंजन- ॥ रूप दिसे कौसल्ये ॥८४॥

दशरथ प्रवेशोनी अंतरीं ॥ पाहे स्थूळ ओसरीवरी ॥ मग सूक्ष्मदेह माजघरीं ॥ न दिसे कदा कौसल्या ॥८५॥

कारण कोठडींत पाहे सादर ॥ तंव तेथें अवघा अंधार ॥ मग महाकारण उपरी थोर ॥ त्यावरी नृप चढिन्नला ॥८६॥

तेथेंहि न दिसे कौसल्या सती ॥ मग चकित पाहे नृपति ॥ जिचे उदरीं सांठवला जगत्पति ॥ तिची स्थिति कळेना ॥८७॥

मग परात्परसांत ॥ प्रवेशता होय अजपाळसुत ॥ तों बैंसली समाधिस्त ॥ निर्विकल्पवृक्षास्तळीं ॥८८॥

अंतरीं दृष्टि मुरडली ॥ वदरळ स्वनाम विसरली ॥ ब्रह्मानंदरूप जाहली ॥ न चाले बोली द्वैताची ॥८९॥

जैसा परम सतेज मित्र ॥ तेथें डाग न लागे अणुमात्र ॥ स्वरूपीं पहुडतां योगेश्र्वर ॥ ज्ञान राहे ऐलीकडे ॥९०॥

कल्पांतविजूस मशक गिळी ॥ पिपीलिका मेरु कक्षेसी घाली ॥ धेनुवत्स मृगेंद्रा आकळी ॥ एखादे वेळे घडेल हें ॥९१॥

परी चतुरा विश्र्वरूपावरी ॥ दृष्टांत न चाले निर्धारीं ॥ श्रोतियांचे यज्ञशाळेभीतरीं ॥ कोठें महारी प्रवेशेल ॥९२॥

वडवानळापुढें कर्पूर जाण ॥ कीं जलनिधिमाजी लवण ॥ तैशी बुद्धि आणि मन ॥ स्वसुखावरी विरालीं ॥९३॥

असो स्वानंदसागरांत ॥ कौसल्या पूर्ण समाधिस्थ ॥ जवळी उभा ठाकला दशरथ ॥ पाहे तटस्थ उगाचि ॥९४॥

कौसल्या स्वस्वरूपीं लीन ॥ हे दशरथासी नेणवे खूण ॥ म्हणे हे रुसली संपूर्ण ॥ तरीच वचन न बोले ॥९५॥

म्हणून राजचक्रचूडामणि ॥ कौसल्येजवळ स्वयें बैसोनी ॥ स्नेहें तीस हृदयीं धरूनी ॥ समाधान करीतसे ॥९६॥

तरी न उघडी नयन ॥ नाहीं शरीराचें भान ॥ मी स्त्रीपुरुषस्मरण ॥ गेली विसरोन कौसल्या ॥९७॥

अलंकार कैंचे एक सुवर्ण ॥ तरंग लटके एक जीवन ॥ तैसे विश्र्व नाहीं एक रघुनंदन ॥ आनंदघन विस्तारला ॥९८॥

ऐसी कौसल्येची स्थिति जाहली ॥ राजा म्हणे हे झडपली ॥ कीं महद्भूतें पूर्ण घेतली ॥ ओळखी मोडली इयेची ॥९९॥

राजा म्हणे देव ऋषि सिद्ध ॥ इहीं दीधला आशीर्वाद ॥ कीं पोटा येईल ब्रह्मानंद ॥ आदिपुरुष श्रीराम ॥१००॥

ऐकतां रामनामस्मरण ॥ कौसल्येनें उघडिले नयन ॥ तों जगदाभास संपूर्ण ॥ रघुनंदनरूप दिसे ॥१॥

राजा म्हणे हो नितंबिनी ॥ कुरंगनेत्रे गजगामिनी ॥ काय जे आवडी असेल मनीं ॥ डोहळे पुरवीन सर्व ते ॥२॥

भ्रम टाकीं बोलें वचन ॥ तों कौसल्या बोले गर्जोन ॥ मी जगदात्मा रघुनंदन ॥ कैंचें अज्ञान मजपासीं ॥३॥

स्थूळ लिंग आणि कारण ॥ यांहून माझें रूप भिन्न ॥ महाकारण हं निरसून ॥ आत्माराम वेगळा मी ॥४॥

द्वैताद्वैत महाद्वैत ॥ याहून वेगळा मी अतीत ॥ सच्चिदानंद शब्द जेथ ॥ खुंटोनियां राहिला ॥५॥

जीव शिव हे दोन्ही पक्ष ॥ ध्याता ध्यान लय लक्ष ॥ यांवेगळा मी सर्वसाक्ष ॥ अचिंत्य अलक्ष श्रीराम ॥६॥

राजा म्हणे कौसल्ये ऐकें ॥ मी कोण आहें मज ओळखें ॥ डोहळे पुसावया महासुखें ॥ तुजजवळी बैसलों ॥७॥

येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ॥ हें सर्व गेलें आटोन ॥ नाहीं स्त्रीपुरुषनपुंसकपण ॥ मी तूंपण तेथें कैंचें ॥८॥

नृप म्हणे हे महद्भूतें घेतली ॥ ओळखी सर्व मोडली ॥ मग पुसे गोष्ट मागली ॥ धाकुटपणींची तियेतें ॥९॥

राजा म्हणे शशांकवदने ॥ गुणसरिते पद्मनयने ॥ वऱ्हाड बुडवोनि तुज रावणें ॥ नेलें होतें आठवतें कीं ॥११०॥

शत्रूचें नाम ऐकतां कर्णीं ॥ हाक फोडिली भुजा पिटोनी ॥ म्हणे धनुष्यबाण दे आणोनी ॥ टाकीन छेदोनि दाही शिरें ॥११॥

ताटिका मारूनियां आधीं ॥ ऋृषियाग पाववीन सिद्धी ॥ महाराक्षस वधोनि युद्धीं ॥ गाधितनय तोषवीन ॥१२॥

शिवचाप परम प्रचंड ॥ मोडोनि करीन दुखंड ॥ माझी ज्ञानशक्ति जे अखंड ॥ पणें जिंकोन आणीन ते ॥१३॥

जेणें निःक्षत्री केली अवनी पूर्ण । त्याचा गर्व हरीन न लागतां क्षण ॥ मी एकपत्नीव्रत रघुनंदन ॥ पितृवचन पाळीन मी ॥१४॥

मी सेवीन घोर विपिन ॥ परिवारेंसी त्रिशिरा खर दूषण ॥ क्षणमात्रें टाकीन वधोन ॥ अग्नि तृण जाळी जेवीं ॥१५॥

रिसां वानरांहातीं ॥ लंका घालीन पालथी ॥ माझा वज्रदेही मारुती ॥ परम पुरुषार्थी महावीर ॥१६॥

क्षणें जाळील राक्षसनगर ॥ शत्रूंचीं शिरें छेदीन अपार ॥ पाषाणीं पालाणोनि समुद्र ॥ लंकापुर घेईन मी ॥१७॥

कौसल्या हाक फोडी दारुण ॥ लंकेपुढें माजवीन रण॥ महाढिसाळ कुंभकर्ण ॥ टाकीन छेदून क्षणार्धें ॥१८॥

सहपरिवारें वधोनि दशशिर ॥ बंदीचे सोडवीन सुरवर ॥ माझा बिभीष्ज्ञण प्रियकर ॥ छत्र धरवीन तयावरी ॥१९॥

स्वपदीं स्थापोनि निजभक्त ॥ मी अयोध्येसी येईन रघुनाथ ॥ आधि व्याधि जरा मृत्य ॥ याविरहित करीन प्रजा ॥१२०॥

स्त्रीपुरुषनपुंसकभेद ॥ यावेगळा मी ब्रह्मानंद ॥ मायाचक्रचाळक शुद्ध ॥ निष्कलंक अभेद पैं ॥२१॥

मी प्रळयकाळासी शासनकर्ता ॥ आदिमायेचा निजभर्ता ॥ कर्ता हर्ता पाळितां ॥ मजपरता नसेचि ॥२२॥

मी अज अजित सर्वेश्र्वर ॥ मी नटलों चराचर ॥ धरोनि नाना अवतार ॥ मी मजमाजीं सामावें ॥२३॥

ऐसें ऐकतां दशरथ ॥ म्हणे हे भूतें घेतली यथार्थ ॥ फांटा फुटलासे बहुत ॥ बडबडत भलतेंचि ॥२४॥

पंचाक्षरी आणा पाचारून ॥ महाराज सद्रुरु ज्ञानघन ॥ तो सरसिजोद्भवनंदन ॥ बोलावून आणा वेगीं ॥२५॥

जेणें दर्भावरी धरिली अवनी ॥ कमंडलु ठेविला सूर्यासनीं ॥ इंद्रसभेसी नेला वासरमणी ॥ अद्रुत करणी जयाची ॥२६॥

वसिष्ठ आला धांवोन ॥ राजा दृढ धरी चरण ॥ म्हणे कौसल्येसारखें निधान ॥ भूतें संपूर्ण ग्रासिलें ॥२७॥

म्यां याग केला सायासीं ॥ कीं पुत्र होईल कौसल्येसी ॥ तों मध्येंच हे विवशी ॥ उठली ऋृषि काय करूं ॥२८॥

मग म्हणे ब्रह्मसुत ॥ इच्या पोटा येईल रघुनाथ ॥ तीस गोष्टी ये विपरीत ॥ कालत्रयीं घडेना ॥२९॥

अंधकूपीं पडेल तरणी ॥ कोरान्न मागेल चिंतामणी ॥ सुधारस गेला कडवटोनी ॥ हें कालत्रयीं घडेना ॥१३०॥

क्षुधेनें पीडिला क्षीरसागर ॥ सुरतरूसी येईल दरिद्र ॥ तीव्र तपेल रोहिणीवर ॥ हें कालत्रयीं घडेना ॥३१॥

असो वसिष्ठ कौसल्येजवळी ॥ येऊनि विलोकी तयेवेळी ॥ तंव ती श्रीरामरूप जाहली ॥ अंतबार्ह्य समूळ ॥३३॥

न दिसे स्त्रियेसी आकृति ॥ धनुष्यबाण घेऊनि हातीं ॥ आकर्ण नयन विराजती ॥ देख मूर्ति जगद्वंद्य ॥३४॥

मूर्ति पाहतां आनंदघन ॥ सद्रद जाहला ब्रह्मनंदन ॥ अष्टभाव दाटले पूर्ण ॥ गेला विसरोनि देहभाव ॥३५॥

वसिष्ठ कौसल्या ते अवसरी ॥ मुरालीं ब्रह्मानंदसागरीं ॥ दशरथ परम अंतरीं ॥ घाबरा जाहला नेणोनियां ॥३६॥

वसिष्ठासारखा महामुनी ॥ भूतें झडपिला येक्षणीं ॥ या भूताची करिता झाडणी ॥ कोणी त्रिभुवनीं दिसेना ॥३७॥

मी हतभाग्य संपूर्ण ॥ मज कैचें पुत्रसंतान ॥ कौसल्याही गेली झडपोन ॥ ब्रह्मानंदें मूर्च्छित ॥३८॥

निरपराध वधिला श्रावण ॥ तेणें हें दुःख दारुण ॥ ऐसा तो महाराज अजनंदन ॥ जळाला पूर्ण अंतरीं ॥३९॥

तों स्वानंदलहरी जिरवून ॥ वसिष्ठें उघडिले नयन ॥ राजा धांवोन धरी चरण ॥ आनंद न माय अंतरीं ॥१४०॥

रायासी कैसी परी जाहली ॥ कीं पुरीं बुडतां नौका आली ॥ अंधकूपीं पडतां तात्काळीं ॥ हस्त सूर्यें दीधला ॥४१॥

सर्पे डंखितां गरुड धांवे ॥ गर्जे कोंडितां केसरी पावे ॥ कीं क्षुधितांपुढें हेलावे ॥ क्षीरसागर येऊनियां ॥४२॥

कीं वणव्यांत जळतां वरुर्षे घन ॥ कीं हुडहुडी भरतां कृशान ॥ कीं दरिद्रें पीडितां लक्ष्मी आपण ॥ घरीं येऊनि बैसली ॥४३॥

ऐसा आनंदला सद्गुरु स्वामी तूं समर्थ ॥ मज नवल हें वाटत ॥ तुजही भूतें झडपिलें ॥४४॥

आम्ही अत्यंत भाग्यहीन ॥ कैंचें देखो पुत्रसंतान ॥ मग हांसिन्नला ब्रह्मनंदन ॥ काय गर्जोन बोलत ॥४५॥

जो नीलग्रीवहृदयरत्न ॥ जो कमलोद्भवाचें देवतार्चन ॥ सनकादिक करोनी यत्न ॥ हृदयसंबळींत वाहती पैं ॥४६॥

तो वैकुंठपुरविलासी ॥ आला कौसल्येच्या गर्भासी ॥ मारूनि सकळ दुष्टांसी ॥ देव सोडवील बंदीचे ॥४७॥

जें जें कौसल्या बोलिली सत्य ॥ तितुकें होईल यथार्थ ॥ तुज होतील चार सुत ॥ सत्य वचनार्थ राजेंद्रा ॥४८॥

शंख चक्र शेष नारायण ॥ चर्तुधा रूपें प्रकटेल जगज्जीवन ॥ ज्याची कथा ऐकतां पापी जन ॥ उद्धरोनि तरतील ॥४९॥

माध्यान्हा येईल चंडकिरण ॥ पुष्य नक्षत्र साधून ॥ अवतरेल रघुनंदन ॥ पूर्णब्रह्म जदद्रुरु ॥१५०॥

ऐसी वसिष्ठांचीं वचनें ॥ कीं स्वानंदनभींचीं उडुगणें ॥ कीं सत्यवैरागरींचीं रत्नें ॥ निवडोनि दीधलीं दशरथा ॥५१॥

तेणें कर्णद्वारें त्वरित ॥ सांठविलीं हृदयसंदुकेंत ॥ धांवोनि गुरूचे पाय धरित ॥ म्हणे कृतार्थ जाहलों मी ॥५२॥

असो भरलिया नवमास ॥ प्रसूतिसमय कौसल्येस ॥ कवण ऋतु कवण दिवस ॥ सावकाश ऐका तें ॥५३॥

वसंतऋततु चैत्रमास ॥ शुक्लपक्ष नवमी दिवस ॥ सूर्यवंशीं जगन्निवास ॥ सूर्यवासरीं जन्मला ॥५४॥

माध्यान्हा आला चंडकिरण ॥ पुष्य नक्षत्र साधून ॥ अवतरला रघुनंदन ॥ पूर्णब्रह्म जगद्रुरू ॥५५॥

श्रीराम केवळ परब्रह्म ॥ त्यासी जाहला म्हणतां जन्म ॥ संत हांसतील परम ॥ तत्त्वज्ञानवेत्ते जे ॥५६॥

ज्याची लीला ऐकतां अपार ॥ खंडे जन्म मृत्यु दुर्धर ॥ त्या रामासी जन्मसंसार ॥ काळत्रयीं घडेना ॥५७॥

दाविली लोकिक करणी ॥ कीं कौसल्या जाहली गर्भिणी ॥ तो ब्रह्मानंद मोक्षदानी ॥ जन्मकर्म त्या कैंचें ॥५८॥

क्षीरसागरींहून नारायण ॥ येऊन अयोध्येसी जाहला सगुण ॥ शेष लक्ष्मीसहित जगज्जीवन ॥ तैसाचि तेथें संचरला ॥५९॥

जे अनंत कल्याणदायक ॥ अज अजित निष्कलंक ॥ भक्त तारावयासी देख ॥ जगन्नायक अवतरला ॥१६०॥

देव करिती जयजयकार ॥ करोनि राक्षससंहार ॥ म्हणती आतां अवतरेल हा रघुवीर ॥ बंधमुक्त करील आम्हां ॥६१॥

असो अयोध्यापुरीं निराळीं ॥ विमानांची दाटी जाहली ॥ दुंदुभीची घाई लागली ॥ पुष्पें वर्षती अपार ॥६२॥

असो ते कौसल्या सती ॥ बैसली असतां एकांतीं ॥ तों अष्टदश वरुषांची मूर्ति ॥ सन्मुख देखे अकस्मात ॥६३॥

निमासुर वदन सुंदर ॥ तेजें भरलें निजमंदिर ॥ ज्या तेजासी शशी मित्र ॥ लोपोनि जाती विलोकितां ॥६४॥

पदकमलमकरंदसेवना ॥ भ्रमरी जाहली क्षीराब्धिकन्या ॥ कदाही न विसंबे चरणां ॥ कृपण धनालागीं जैसा ॥६५॥

संध्याराग अरुण बालार्क ॥ दिव्य रत्नांचे काढिले रंग देख ॥ तळवे तैसे सुरेख ॥ श्रीरामाचे वाटती ॥६६॥

चंद्र क्षयरोगें कष्टी होऊनि ॥ निजांगाची दश शकलें करोनि ॥ सुरवाडला रामचरणीं ॥ स्वानंदधणी घेतसे ॥६७॥

रमा पदीं रंगली दिवसनिशीं ॥ तों बंधु पाहुणा आला शशी ॥ तोही राहिला अक्षय व्हावयाची ॥ नव जायची माघारा ॥६८॥

ध्वज वज्रांकुश पद्म ॥ ऊर्ध्वररेखा चक्रादि चिन्हें उत्तम ॥ यांचा अर्थ ऐकतां परम ॥ सुख होय भक्तांसी ॥६९॥

सात्त्विक प्रेमळासी देखा ॥ ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्वररेखा ॥ सत्यशील धार्मिकां भाविकां ॥ ऊर्ध्वपंथ दाविती ॥१७०॥

विद्यामंदें मत्त गज ॥ एक भाग्यमंदें डुलती सहज ॥ त्यांसी आकर्षावया सहज ॥ अंकुश पायीं झळकतसे ॥७१॥

पायीं झळके दिव्य पद्म ॥ तें पद्मेचें राहतें धाम ॥ ते जगमाउली सप्रेम ॥ तये पदीं सुरवाडली ॥७२॥

अहंकार जड पर्वत ॥ शरणागतां बाधक यथार्थ ॥ तो फोडावयासी तळपत ॥ वज्र पायीं रामाच्या ॥७३॥

भवसागर तरावया गहन ॥ जहाज अद्भुत रामचरण ॥ त्यावरी ध्वजविराजमान ॥ रात्रंदिन तळपतसे ॥७४॥

काम क्रोध दुर्धर असुर ॥ त्यांचें छेदावया शिर ॥ दैदीप्यमान दिव्य चक्र ॥ रामतळवां झळकतसे ।७५॥

मळरहित प्रपद सुंदर ॥ घोंटीव त्रिकोणयंत्राकार ॥ इंद्रनीळ उपमा साचार ॥ न पुरती कठीण म्हणोनियां ॥७६॥

पदतलें आरक्त साजिरीं ॥ वसे तेथें सरसिजोद्भवकुमरी ॥ विश्रांति घ्यावया अहोरात्रीं ॥ रामचरणीं रंगली हो ॥७७॥

किती पापें हरावीं दिवरजनीं ॥ म्हणोनि श्रमली जन्हुनंदिनी ॥ शुभ वांकी होऊनी ॥ रामचरणीं विराजे ॥७८॥

मांड्या सुकुमार सांवळिया ॥ तेथें सुरवाडली मित्रतनया ॥ कीं यमनुजा अपवाद चुकवावया ॥ महदाश्रय करितसे ॥७९॥

ऐशी रामपदीं त्रिवेणी साचार ॥ प्रयाग तीर्थराज पावन थोर ॥ प्रेमें माघमासीं सभाग्य नर ॥ प्रातःस्नानासी धांवती ॥१८०॥

भक्त मुमुक्षु साधक संत ॥ हेचि राजहंस विराजत ॥ वांकीवरी रत्नें तळपत ॥ तेचि तपस्वी तपताती ॥८१॥

चरणध्वज झळके स्पष्ट ॥ तोच जाणिजे अक्षय वट ॥ जेथें सनकादिक वरिष्ठ ॥ क्षेत्रसंन्यासी जाहले ॥८२॥

प्रयागीं मोक्ष देह त्यागितां ॥ येथें मोक्ष श्रवण करितां ॥ देहीं असतां विदेहता ॥ येते हाता भक्तांच्या ॥८३॥

त्या प्रयागीं कष्ट बहुत ॥ येतां जातां भोगिती अमित ॥ हा प्रयाग ध्यानीं अकस्मात ॥ प्रकटे सत्य भक्तांच्या ॥८४॥

तोडर वांकी नूपुरें ॥ असुरांवरीं गर्जती गजरें ॥। वाटे नभ गाळोनि एकसरें ॥ पोटऱ्या जानू ओतिल्या ॥८५॥

की सरळ कर्दळीचे स्तंभ ॥ कीं गरुडपाचूंचे उगवले कोंभ ॥ कीं इंद्रनीळ गाळोनि सुप्रभ ॥ जानू जंधा ओतिल्या ॥८६॥

मिळाल्या सहस्र चपळा ॥ तैसा कांसे झळके पीतांबर पिवळा ॥ वरी तळपे कटिमेखळा ॥ पाहतां डोळां आल्हाद ॥८७॥

कटिमेखळेवरी महामणी ॥ कीं पंक्ती बैसले वासरमणी ॥ दाहकत्व सांडूनि जघनीं ॥ श्रीरामाच्या लागले ॥८८॥

वेदांतींच्या श्रुति गहन ॥ अर्थ बोलती जेवि शोधून ॥ तैशा क्षुद्रघंटा रुणझुण ॥ शब्द करिती रसाळ ॥८९॥

देखून कटिप्रदेश सुकुमार ॥ लाजोनि वना गेला मृगेंद्र ॥ वाटे त्या दुःखें स्वशरीर ॥ वान केलें दुर्गेचें ॥१९०॥

गंभीरावर्त नाभिस्थन ॥ जेथें जन्मला चतुरानन ॥ सत्व रज तम गाळून ॥ त्रिवळी उदरीं विराजे ॥९१॥

कौस्तुभतेज अपार ॥ पाहतां भुलती शशिमित्र ॥ गुणीं ओंविलीं नक्षत्रे समग्र ॥ मुक्ताहार डोलती तेंवि ॥९२॥

कीं त्या मुक्तांच्या माळा बहुत ॥ रघुपतीच्या गळां डोलत ॥ कीं मुक्तारूपें समस्त ॥ अनंत ब्रह्मांडें गुंफिलीं ॥९३॥

मुक्तामाळांचें तेज गहन ॥ परी त्यांचा पालटला वर्ण ॥ दिसती इंद्रनीळासमान ॥ श्यामलांगीं रघुपतीच्या ॥९४॥

नीळ गगनावरी सुंदर ॥ मंदाकिनीओघ दिसे शुभ्र ॥ तैसा अम्लान सुमनहार ॥ श्यामतनूवरी शोभत ॥९५॥

श्यामलांगी अति निर्मळ ॥ वरी डोले वैजंतीची माळ ॥ पुष्करीं शक्रचाप सुढाळ ॥ सुरंग जैसें मिरवतसे ॥९६॥

मीं मेघीं स्थिरावली क्षणप्रभा ॥ तैशी वैजयंतीची शोभा ॥ सहस्रमुखाच्या जिभा ॥ गुण वर्णितां शिणल्या हो ॥९७॥

अनंत भक्त हृदयीं धरिले ॥ तरीच वक्षःस्थळ रुंदावलें ॥ ब्रह्मानंद मुरोनि ओतिलें ॥ हृदयस्थान सत्य पैं ॥९८॥

श्रीवत्स झळके सव्यांगीं ॥ श्रीनिकेतन वामभागीं ॥ उटी शोभे श्यामलांगीं ॥ कोण्या दृष्टांतें तें ऐका ॥९९॥

मित्रकन्येवरी जान्हवीजळ ॥ कीं राकाइंदुप्रभेनें शोभे निराळ ॥ कीं दैदीप्य मणि इंद्रनीळ ॥ आवरण त्यावरी काश्मिराचें ॥२००॥कीं हळाहळ जाहले अपार ॥ म्हणोनि धांवला कर्पूरगौर ॥ चंदनरूपें तो प्राणमित्र ॥ श्यामलांगीं जडला हो ॥१॥

तैसी उटी दिसे सुढाळ ॥ कीं चंद्रबिंब उकले निर्मळ ॥ कीं मुक्ताफळांचा गोळा सुढाळ ॥ इंद्रनीळा चर्चियेला ॥२॥

शंख चक्र धनुष्य बाण ॥ चोहों हस्तीं शोभायमान ॥ हस्तकटकांचे तेजे करून ॥ उजळीत नभातें ॥३॥

क्षणप्रभेचीं चक्रें तळपती ॥ तैशा मुद्रिका करीं झळकती ॥ किंवा औपासक यंत्रें रेखिती ॥ तेचि गति येथें दिसे ॥४॥

प्रळयग्नीनें उघडिले नयन ॥ तेंवि कीर्तिमुखें परिपूर्ण ॥ कीं निष्कलंक रोहिणीरमण ॥ पदक हृदयीं डोलतसे ॥५॥

कंबुकंठ अति शोभत ॥ नासिक सरळ सुकुमार बहुत ॥ मंदिस्मितवदन ॥ विराजत ॥ कोटि मन्मथ ओंवाळिजे ॥६॥

विद्रुमवर्ण अधर सतेज ॥ माजी ओळीनें झळकती द्विज ॥ त्या तेजें शशी नक्षत्रें तेजःपुंज ॥ झांकोळती पाहतां ॥७॥

त्रैलोकींचा मेळवोनि आनंद ॥ ओतिलें रामाचें वदनारविंद ॥ आकर्ण नेत्र भु्रकुटी विशद ॥ धनुष्याकृति शोभती ॥८॥

स्वानंदसरोवरींचीं कमलदलें ॥ तैसे आकर्ण नयन विकासले ॥ त्या कृपादृष्टीनें निवाले ॥ प्रेमळ जन सर्वही ॥९॥

कुंडलें तळपती मकराकार ॥ कीं जडले रवि रोहिणीवर ॥ कीं अंगिरापुत्र भृगपुत्र ॥ विचार पुसती रामातें ॥२१०॥

कीं वेदसागरींच्या रत्नज्योती ॥ पूर्वउत्तर मीमांसा निश्र्चिती ॥ कुंडलरूपें जाणविती ॥ अर्थ विशेष स्वामीतें ॥११॥

श्रीरामतनु सुकुमार ॥ तेणें शोभती अलंकार ॥ पीतवर्ण टिळक सुंदर ॥ अनुपम्य रेखिला ॥१२॥

सुवर्णोदक नदीचा पूर ॥ नीळगिरीपाठारीं निरंतर ॥ तैसा टिळक सुंदर ॥ विशळभाळीं झळकतसे ॥१३॥

जैसा कल्पांतींचा दिनकर ॥ तैसा मुकुट दिसे जाज्वल्य सुंदर ॥ तेज तळपतसे अपार ॥ चक्रामाजी न समाये ॥१४॥

दावाग्नीचा कल्लोळ भडकत ॥ तैसें उत्तरीय वस्त्र रुळत ॥ दशांप्रति मुक्तें झळकत ॥ कृत्तिकापुंज जयापरी ॥१५॥

तें परम तेजाळ क्षीरोदक ॥ कीं शुभ्र यशा चढलें बीक ॥ शुभ्र श्र्वेत मृडानीनायक ॥ कर्पूरेंकरूनि उटिला कीं ॥१६॥

कीं दिव्य रजततगट घडलें ॥ कीं पारंदें कैलास डवरिलें ॥ कीं जान्हवीतोयें ओपविलें ॥ दिनकरनाथें स्वहस्तें ॥१७॥

सच्चिदानंदतनु सगुण ॥ अतसीकुसुमाभास पूर्ण ॥ त्याचि रंगेकरून ॥ नीलोत्पलें राबविलीं ॥१८॥

नभासीं चढला तोच रंग ॥ त्याचि प्रभेनें रंगले मेघ ॥ इंद्रनीळही सुरंग ॥ त्याच प्रकाशें प्रकाशले ॥१९॥

तेथींचें सौंदर्य अद्भुत ॥ गरुडपाचूंसी तेज दिसत ॥ मर्गजासी बीक चढत ॥ तनु सांवळी देखोनीयां ॥२२०॥

तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर ॥ भक्तमंदिरांगणमंदार ॥ कुरवंडी करूनि सांडावे साचार ॥ कोटि मकरध्वज वरोनियां ॥२१॥

ब्रह्मांड फोडोनि बाहेरी ॥ आंगींचा सुवास धांवत वरी ॥ लावण्यामृतसागर कैटभारी ॥ लीलावतारी साधक जो ॥२२॥

पूर्णब्रह्मानंद रघुवीर ॥ लीलाविग्रही श्रीधरवर ॥ हृदयीं रेखिला निरंतर ॥ निजभक्तीं प्रेमभरें ॥२३॥

असो कौसल्या बोले ते अवसरीं ॥ भक्तवत्सला मधुकैटभारी ॥ तूं आतां बाळवेष धरीं ॥ माझें उदरीं अवतरें ॥२४॥

लोक म्हणतील कौसल्यानंदन ॥ ऐसा होय तूं मनमोहन ॥ अमलदल राजीवनयन ॥ हास्यवदन विलोकीं ॥२५॥

सजलजलदवर्ण कोमळ ॥ तो कौसल्येपुढें जाहला बाळ ॥ तंव ते परम सुवेळ ॥ पुष्यार्कयोग ते समयीं ॥२६॥

जो क्षीरसागरवासी तमालनीळ ॥ तो कौसल्येपुढें जाहला बाळ ॥ चरणांगुष्ठ धरोनि कोमळ ॥ मुखकमळीं घालीतसे ॥२७॥

भक्त चरणीं लागले बहुत ॥ गोड म्हणोन वाखाणित ॥ यालागीं गोडी रघुनाथ ॥ स्वयें पाहत चाखोनियां ॥२८॥

कीं स्वचरणगोडी सेवित ॥ भक्तांसी लोभ लागावया बहुत ॥ म्हणोनियां कौसल्यासुत ॥ कौतुकार्थ दावीतसे ॥२९॥

पुत्र जाहला कौसल्येस ॥ लागला वाद्यांचा एकचि घोष ॥ सुरांसहित सुराधीश ॥ जयजयकार नभीं करिती ॥२३०॥

सुमनसंभार ते अवसरीं ॥ देव वर्षती अयोध्येवरी ॥ दुंदुभिनाद अंबरीं ॥ न मायेचि तेधवां हळदीकुंकुमें ताटें भरूनी ॥

बिदोबिदी धांवती सुवासिनी ॥ पावल्या कौसल्येच्या सदनीं ॥ वेगें करोनि तेधवां ॥३२॥

मंगळतुरांचा एकचि नाद ॥ घरोघरीं ब्रह्मानंद ॥ ते समयींचा आनंद ॥ भोगींद्र वर्णूं शकेना ॥३३॥

आनंदला ब्रह्मनंदन ॥ चहूंकडोन धांवले ब्राह्मण ॥ जैसा क्षीरसागर देखोन ॥ क्षुधार्थी वेगें पावती ॥३४॥

कीं महापर्वकाळ प्रकटला ॥ प्रयागासी धांवे भक्तमेळा ॥ कीं गांवासमीप परिस निघाला ॥ दुर्बळ धांवती लोह घेऊनी ॥३५॥

कीं तृषाक्रांत गोभार सकळी ॥ धांवती जैसे गंगाजळीं ॥ कीं वृक्ष दाअले देखून फळीं ॥ विहंगम जैसे झेंपावती ॥३६॥

तैसी ब्रह्मणांची ते काळीं ॥ दाटी जाहली राजाजवळी ॥ पुत्रमुख पहावया ते वेळीं ॥ दशरथराव चालिला ॥३७॥

दशरथ म्हणे याचकांसी ॥ जे जे इच्छा असेल मानसीं ॥ तें तें मागा मजपाशीं ॥ येच समयीं दईन ॥३८॥

भांडारें फोडिलीं बहुत ॥ याचकांसी म्हणे दशरथ ॥ मोटा बांधोनि अमित ॥ आवडे तितुकें न्या आतां ॥३९॥

समागमें घेऊन ब्राह्मण ॥ महाराज तो अजनंदन ॥ प्रवेशला आनंदेकरून ॥ कौसल्यासदनीं तेधवां ॥२४०॥

दशरथें करोनियां स्नान ॥ केलें आधीं पुण्याहवाचन ॥ पहावयासी पुत्रवदन ॥ राजा जवळी पातला ॥४१॥

श्रीरामवदन ते अवसरीं ॥ न्याहाळितां तोषला अंतरीं ॥ मधुबिंदु घालोनि मुखाभीतरीं ॥ मधुकैटभारि तृप्त केला ॥४२॥

श्रीरामाचें जातक ॥ करी तेव्हां नृपनायक ॥ गो भूरत्नें असंख्य ॥ मग देत याचकांसी ॥४३॥

रत्नजडित सिंहासन ॥ त्यावरी माय बैसली राम घेऊन ॥ मृगांकवर्ण चामरें जाण ॥ दोघी ढाळिती दोहींकडे ॥४४॥

पीकपात्र घेऊनि हातीं ॥ समीप विलसे एक दूती ॥ कनकांबराची घेऊन बुंथी ॥ बैसली सती कौसल्या ॥४५॥

भोंवते वेष्टिले विद्वजन ॥ त्यांसी भूतभविष्यवर्तमानज्ञान ॥ सातशतें स्त्रिया धांवोन ॥ येत्या जाहल्या दशरथाच्या ॥४६॥

जैशा केवळ विद्युल्लता ॥ तैशा अलंकारवस्त्रमंडिता ॥ पाळां कौसल्येभोंवता ॥ शोभेल कैसा ते वेळीं ॥४७॥

महामाया आदिभगवती ॥ तीभोंवत्या मिळाल्या अनंतशक्ति ॥ कीं सूर्यचक्रासी वेष्टिती ॥ किरणें जैसी तयापरी ॥४८॥

वसिष्ठ गुरु होऊन पुढें ॥ विलोकी श्रीरामाचें रूपडें ॥ जे जे जन्मकर्मनिवाडे ॥ ते रायापुढें सांगत ॥४९॥

म्हणे हा क्षीरसागरविहारी ॥ जन्मला कौसल्येचें उदरीं ॥ निजजन तारावयासी निर्धारीं ॥ अवतरला आदिपुरुष ॥२५०॥

द्वादश वर्षे यासी भरतां ॥ एक द्विज येईल अवचिता ॥ प्रार्थोनियां दशरथा ॥ घेऊन यासी जाईल ॥५१॥

आरंभीं सोडोनि एक बाण ॥ राक्षसी वधील दारुण ॥ गोब्राह्मणमाखपाळण ॥ करील जाण पुत्र तुझा ॥५२॥

कृशान प्रवेशे शुष्कविपिनीं ॥ तैसा जाळील राक्षस मुखरक्षणीं ॥ पुढें चरणस्पर्शेकरूनी ॥ एक ललना उद्धरील ॥५३॥

परम प्रचंड कोदंड ॥ तें स्वदंडबळें करील दुखंड ॥ एकपत्नीव्रत प्रचंड ॥ वीर होईल त्रिभुवनीं ॥५४॥

महायोद्धा एक ब्राह्मण ॥ त्यास जिंकील न लगतां क्षण ॥ बंधुसहित परतोन ॥ अयोध्येसी येईल ॥५५॥

राज्यीं बैसतां हा वरिष्ठ ॥ एक होईल महा अरिष्ट ॥ नगरलोक पावतील कष्ट ॥ खेद उत्कट करितील ॥५६॥

हा नरवीर पंचानन ॥ प्रेमें पाळील पितृवचन ॥ मग स्त्रीसमवेत ॥ कानन ॥ चतुर्दश वर्षें सेवील ॥५७॥

हा नसतां आश्रमांत ॥ एक राक्षस येईल अकस्मात ॥ याचे स्त्रियेस नेईल सत्य ॥ षण्मासपर्यंत निर्धारें ॥५८॥

मग हा स्त्री शोधित अरण्यांत ॥ वानर मिळतील अकस्मात ॥ एक वानर उन्मत्त ॥ त्यास मारील हा न कळतां ॥५९॥

ब्रह्मांड नाचवील नखाग्नीं ॥ ऐसा एक वानरकेसरी ॥ जाऊन समुद्रसंभवपुरीं ॥ महाप्रळय करील तो ॥२६०॥

शुद्धि आणितां राघवेंद्र ॥ पाषाणीं पालाणील समुद्र ॥ शरण येईल एक रजनीचर ॥ चिरंजीव त्यासी करील हा ॥६१॥

मारूनि राक्षसां सकळां ॥ सोडवील सुरांच्या बंदिशाळा ॥ मागुती येईल स्वस्थळा ॥ अयोध्यापुरा गजरेंसीं ॥६२॥

अकरा सहस्र संवत्सर ॥ राज्य करील हा राजेंद्र ॥ पुढें पुत्रासी युद्ध थोर ॥ करील कौतुकें करूनियां ॥६३॥

शेवटीं अयोध्या विमानीं घालोनी ॥ नेऊन ठेवील वैकुंठभुवनीं ॥ ऐसें जातक ऐकोनि कर्णीं ॥ राव दशरथ तोषला ॥६४॥

स्तनपान करितां रघुनंदन ॥ पाहे वसिष्ठाकडे परतोन ॥ कीं वाल्मीकभाष्य संपूर्ण ॥ कथिलें येणें अवलीलें ॥६५॥

तों सुमित्रेसी जाहला पुत्र ॥ म्हणोनि धांवत आले विप्र ॥ क्षीरसागरींहूनि श्रीधर ॥ कौसल्येमंदिरी पातला ॥६६॥

तंव तो भोगींद्र पाळती घेत ॥ पाठिराखा पातला त्वरित ॥ सुमित्रेचे शेजे रिघत ॥ बाळदशा धरोनियां ॥६७॥

सुमित्रा स्वप्न देखत ॥ कीं मज जाहला सुलक्षण सुत ॥ सावध होवोनियां पाहत ॥ पुढें खेळत बाळक तो ॥६८॥

ऐसा जन्मला सुमित्रानंदन ॥ विप्रांसहित दशरथ येऊन ॥ तात्काळ केलें पुण्याहवाचन ॥ जातकर्मादि सर्वही ॥६९॥

कैकयीस जाहले दोन कुमर ॥ ते विष्णूचे शंखचक्र अवतार ॥ परी कैसे जन्मले तो विचार ॥ कैकयीस नेणवे ॥२७०॥

सुषुप्तीमाजी कैकयी निमग्न ॥ जैसा पंकगर्तेत पाषाण ॥ पुत्र येऊनि दोघेजण ॥ दोहींकडे खेळताती ॥७१॥

दासी येऊन कैकयीप्रति ॥ थापटोनि जागी करिती ॥ दोघे पुत्र जन्मले निश्र्चितीं ॥ सावध होऊन पाहें पां ॥७२॥

कैकयी पाहे पुत्रमुख ॥ तों मित्र आणि मृगांक ॥ तेंवि दोघे खेळती बाळक ॥ देखतां सुख वाटलें ॥७३॥

रायें तेथेंही येऊन ॥ अवलोकिले दोघे नंदन ॥ सुखी केले याचकजन ॥ वस्त्राभरणें करूनियां ॥७४॥

बारा दिवसपर्यंत ॥ महोत्साह राव करित ॥ मंगळतुरे गर्जत ॥ रात्रंदिवस राजगृहीं ॥७५॥

तेरावे दिवशीं वसिष्ठऋषि ॥ नामकरण ठेवी चौघांसी ॥ कौसल्येचा राम तेजोराशी ॥ जो वैकुंठवासी जगदात्मा ॥७६॥

सुमित्रेचा नंदन ॥ त्याचें नाम ठेविलें लक्ष्मण ॥ जो काद्रवेयकुलभूषण ॥ विष्णु शयन ज्यावरी करी ॥७७॥

कैकयीचे जे कां सुत ॥ भरत शत्रुघ्न निश्र्चित ॥ चौघे दशरथी जगविख्यात ॥ ऐका चरित्र तयांचें ॥७८॥

ज्यांची जन्मकर्मलीला ऐकतां ॥ पळ सुटे सर्व दुरितां ॥ जैसा महाप्रभंजन सुटतां ॥ जलदजाळ वितळे पैं ॥७९॥

श्रीरामकथा मानससरोवर ॥ तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर ॥ साहित्य मुक्तें सुढाळ थोर ॥ सेवा निरंतर आदरें ॥२८०॥

श्रीरामकथा सुधारस ॥ तुम्ही पंडित श्रोते त्रिदश ॥ प्राशन करा सावकाश ॥ अति सुरस ग्रंथ हा ॥८१॥

पुराणपुरुष परात्पर ॥ तो ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अयोध्येंत अवतरला साचार ॥ त्याचें चरित्र परिसा पुढें ॥८२॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

चतुर्थाध्याय गोड हा ॥२८३॥

श्रीरामविजयअध्याय वा

श्री गणेशाय नमः ॥

श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

श्रीरामकथा तेजः पुंज ॥ हेंचि विशाळ दिव्य जहाज ॥ जयासी नवखण सहज ॥ नवविधा भक्तीचे ॥१॥

एकएका खणाआंत ॥ बैसले अनुतापी महाभक्त ॥ प्रेमाचें शीड वरी फडकत ॥ पालवीत मुमुक्षूंतें ॥२॥

येथें कर्णधार निश्र्चित ॥ स्वयें जाणिजे श्रीरघुनाथ ॥ तोचि पैलपारासी नेत ॥ निजदासां बैसवूनि ॥३॥

त्या श्रीरामाचें नाम गोड ॥ कथा ज्याची गगनाहूनि वाड ॥ जे लीला ऐकतां पुरे कोड ॥ नलगे चाड आणिकांची ॥४॥

जों जों श्रोते कथेसी सादर ॥ तां तों रस चढे अपार ॥ जैसा पुष्करी देखतां रोहिणीवर ॥ चंद्रकांता पाझर सुटे ॥५॥

बृहस्पतीसारिखा वक्ता मतिमंद मिळालिया श्रोता ॥ तैं व्यर्थ गेली ते कथा ॥ जों नाहीं सादरता श्रोतयांसी ॥६॥

जैसें काननामाजी रुदन ॥ कोणी न पुसे तयालागून ॥ तैसें मतिमंदाप्रति श्रवण ॥ करवणें त्याचप्रकारें ॥७॥

जैसीं अन्नें केलीं स्वादिष्ट ॥ परि जेवणार बैसले रोगिष्ठ ॥ तरी ते सुगरणीचे कष्ट ॥ शून्यस्थानीं पडिले कीं ॥८॥

षड्रसअन्नें केलीं परिकर ॥ परि तो जेवूं जाणे काय खर ॥ पंकगर्तेंत सुंदर ॥ हिरा नेऊन टाकिला ॥९॥

कवित्वसागरींचीं रत्नें दृष्टांत ॥ त्यांचे परिक्षक ज्ञाते पंडित ॥ मतिमंद कुटिल निश्र्चित ॥ त्यांस परीक्षा नकळे हे ॥१०॥

सुधारस उकिरडां ओतिला ॥ गर्भांधासी दर्पण दाविला ॥ कीं दिव्य मंचक घातला ॥ चिताभूमीस नेऊनीयां ॥११॥

कीं कागासी समर्पिलीं अमृतफळें ॥ उष्ट्रापुढें सोलींव केळें ॥ कीं जे मृत्युप्राय निजेले ॥ त्सांसी पूजिले व्यर्थ जेंवि ॥१२॥

कीं अनर्ध्य रत्नमाळा ॥ घातली दिवाभीताचे गळां ॥ कीं कस्तूरीटिळक रेखिला ॥ सूकराचे लल्लाटीं ॥ तैसी मतिमंदापुढें कथा ॥

वाग्विलासिनी संतापें बोलतां ॥ जैसी पद्मिणी राजदुहिता ॥ षंढाप्रति दीधली ॥१४॥

भग्नपात्रामाजी नीर ॥ कदाकाळीं न राहे स्थिर ॥ तरी तुम्ही भक्त वरिष्ठ चतुर ॥ कथा सादर परिसा हो ॥१५॥

आधींच मुक्ताफळ वरी सुवास ॥ आधींच हिरा त्यावरी परिस ॥ तैसा आधीं चतुर वरी प्रेमरस ॥ श्रीरामासी आवडे तो ॥१६॥

असो चतुर्थाध्यायाचे अंतीं ॥ कथा सुरस परिसिली संतीं ॥ सांगितली श्रीरामाची जन्मस्थिति ॥ बंधूसहित सर्वही ॥१७॥

जो सरसिजोद्भवाचा पिता ॥ त्यासी दशरथ बाप कौसल्या माता ॥ भक्त तरावया तत्वतां ॥ अयोध्येमाजी प्रकटला ॥१८॥

अहो दशरथाचें भाग्य थोर ॥ रत्नजडित पालख सुंदर ॥ चारी लांबविले परिकर ॥ चौघे कुमर निजती तेथें ॥१९॥

तेरावे दिवशीं पाळणां ॥ पहुडविला रामराणा ॥ जो अगम्य वेदपुराणां ॥ जो जो म्हणोनि हालविती ॥२०॥

जो सनकादिकांचें ध्यान ॥ मृडानीपतीचें चिंतन ॥ जो चतुरास्याचें देवतार्चन ॥ जो जो म्हणोनि हालविती ॥२१॥

जो आदिमायेचा निजवर ॥ जो पुराणपुरुष परात्पर ॥ जो मायाचक्रचाळक चतुर ॥ जो जो म्हणोनि हालविती ॥२२॥

जो अगम्य दशशतवदना ॥ प्रेमपाळणीं तो रामराणा ॥ जवळीं ज्या उभ्या ललना ॥ सुवासिनी कोण त्या ऐका ॥२३॥

निर्वाणदीक्षा स्वरूपस्थिती ॥ मुमुक्ष निष्कामना प्रतीति ॥ सुलीनता समाधि सद्भति ॥ लीला गाती स्वानंदें ॥२४॥

परा पश्यंती मध्यमा वैखरी ॥ गजरें गाती चौघी नारी ॥ चाऱ्ही मुक्ति निर्धारी ॥ चहूं कोणीं तटस्थ ॥२५॥

घरांत मुख्य ह्या सुंदरी ॥ इतर बैसल्या बाहेरी ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नारी ॥ त्यांसी रावणारी दिसेना ॥२६॥

असंभावना विपरीतभावना ॥ विक्षेपता गतायाता जाणा ॥ तुर्या दावी शहाणपणा ॥ बहुत जाणती असें मी ॥२७॥

बारा सोळा चौदा नारी ॥ गलबला करिती बाहेरी ॥ चौसष्टी दाविती कळाकुसरी ॥ परी अंतरीं प्रवेश नव्हेचि ॥२८॥

असो सकळ नितंबिनी ॥ ओंटी कौसल्येची भरूनि ॥ वस्त्रें अलंकार समर्पूनि ॥ सदनीं गेल्या आपुलाल्या ॥२९॥

अयोध्येसी जन्मतां रघुपति ॥ विघ्नें राक्षसां जाणवती ॥ प्रळयविजा कडकडून पडती ॥ लंकेवरी अकस्मात ॥३०॥

कांपों लागलें लंकानगर ॥ भूकंप होत वारंवार ॥ उगेंच मोडलें राजछत्र ॥ सभा प्रेतवत दिसतसे ॥३१॥

महाद्वारीं भूमि उलत ॥ रावण जों भद्रीं चढत ॥ तों दाही मस्तकींचे पडत ॥ मुकुट खालीं उगेचि ॥३२॥

शक्रारि पाहे आरसा निर्मळ ॥ तों आंत न दिसे शिरकमळ ॥ राजमंदिरावरी अमंगळ ॥ दिवाभीतें बोभावती ॥३३॥

स्वप्न देखे मंदोदरी ॥ कीं मर्कटें तोडिली गळसरी ॥ विगतधवा ज्या कां नारी ॥ ओंटी भरिती धुळीनें ॥३४॥

ललाटशून्य सुलोचना ॥ देखती जाहली मयकन्या ॥ चिंता पडली रावणा ॥ म्हणे ईश्र्वर क्षोभला कीं ॥३५॥

ईश्र्वर जाहलिया पाठमोरा ॥ नसतीं विघ्नें येती घरा ॥ महारत्नें होती गारा ॥ कोणी न पुसती तयांतें ॥३६॥

आपुलें द्रव्य लोकांवरी ॥ तें बुडोन न जाय लाभे करीं ॥ ज्यांचें देणें ते द्वारीं ॥ बैसती आण घालोनी ॥३७॥

वैरियां करी सांपडे वर्म ॥ अपयश येऊन बुडे धर्म ॥ विशेष वाढे क्रोध काम ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥३८॥

आपुले जे कां शत्रु पूर्ण ॥ ज्यांसी आपण पीडिलें दारुण ॥ अडल्या धरणें त्यांचे चरण ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥३९॥

लाभाकारणें निघे उदीमास ॥ तों हानिच होय दिवसेंदिवस ॥ पूज्यस्थानीं अपमान विशेष ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४०॥

सुहृद आप्त द्वेष करिती ॥ नसते व्यवहार येऊन पडती ॥ सदा तळमळ वाटे चित्तीं ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४१॥

आपलें राज्य संपत्ति धन ॥ शत्रु भोगूं पाहे आपण ॥ देहीं पीडील व्याधिविण ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४२॥

विद्या बहुत जवळी असे ॥ परी तयासी कोणी न पुसे ॥ बोलों जातां मति भ्रंशे ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४३॥

ठेविला ठेवा न सांपडे ॥ नसतीच व्याधि आंगीं जडे ॥ सदा भय वाटे चहूंकडे ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४४॥

वृद्धपणीं येई दरिद्र ॥ स्त्री मृत्यु पावे गेले नेत्र ॥ उपेक्षूनि हेळसिती पुत्र ॥ तरी देव क्षोभला जाणिजे ॥४५॥

असो लंकेमाजी रावण ॥ सांगे प्रधानासी बोलावून ॥ अहोरात्र सावधान ॥ लंकानगर रक्षावें ॥४६॥

अयोध्येसी राम जन्मतां तात्काळ ॥ वृक्ष विराजती सदा फळ ॥ गाई दुभती त्रिकाळ ॥ क्षीर तुंबळ न सांवरे ॥४७॥

आधिव्याधिरहित लोक ॥ नाहीं चिंता दरिद्र दुःख ॥ शुष्क धरणी अपार पीक ॥ पिकों लागली तेधवां ॥४८॥

अवतरतांच जगज्जीवन ॥ जन जरारहित जाहले तरुण ॥ अविद्यापाप मुळींहून ॥ देशधडी जाहलें ॥४९॥

दरिद्री जाहले भाग्यवंत ॥ मूर्ख ते बोलके पंडित ॥ कुरूप ते स्वरूपवंत ॥ दैदीप्यमान तेजस्वी ॥५०॥

अवतरतांच श्रीराम ॥ निःशेष गेले क्रोध काम ॥ अयोध्यावासियां सुकाळ परम ॥ स्वानंदाचा जाहला ॥५१॥

गृहीं प्रकाशतां प्रभाकर ॥ मग कैंचा उरे अंधकार ॥ गृहस्वामी येतां तस्कर ॥ पळोनि जाती चहूंकडे ॥५२॥

कीं बोलतां ज्ञानी वेदांत ॥ सुकळ मतें होती कुंठित ॥ कीं सद्विवेक होतां पळती ॥ तैसा अवतरतां रघुपति ॥ दोष दुष्काळ निमाले ॥५४॥

असो दशरथ सुत ॥ एकामागें एक रांगत ॥ कौसल्या आणि दशरथ ॥ संतोषती पाहतां ॥५५॥

पाचुबंद अंगणांत ॥ हळूहळू चौघे चालत ॥ एकासी एक पाहून हांसत ॥ बाळभावेंकरोनियां ॥५६॥

कौसल्या उभी राहोनियां ॥ चौघांसी बोलावी जेवावया ॥ तंव ते दूर जाती पळोनियां ॥ धांवोनि माय धरी मागें ॥५७॥

चौघांची मुखें धुवोनी ॥ भोजनासी बैसवी दटावुनी ॥ संतोष वाटे दशरथाचे मनीं ॥ चारी मूर्ति पाहतां ॥५८॥

म्हणे कोण पुण्याचे पर्वत ॥ मी पूर्वी आचरलों बहुत ॥ तरीच हे चौघे आदित्य ॥ अवतरले माझें पोटीं ॥५९॥

चिमण्या मूर्ति चिमणे ठाण ॥ चिमणीं धनुष्यें चिमणे बाण ॥ चिमणीं नूपुरें रुणझुण ॥ पायीं गर्जती चौघांचे ॥६०॥

जाहले अष्टवर्षांचे सुंदर ॥ चौघांस समान वस्त्रअलंकार ॥ चिमणीं धनुष्य परिकर ॥ चिमणे शर सोडिती ॥६१॥

चिमणा पीतांबर कटिमेखळा ॥ चिमणीं पदकें मुक्तमाळा ॥ चिमण्या सेवकांचा पाळा ॥ रामाभोंवता शोभतसे ॥६२॥

उन्हांत खेळतां रघुपति ॥ सेवक मित्रपत्रें धरिती ॥ एक चामरें वरी ढाळिती ॥ राजनीतीकरोनियां ॥६३॥

श्रीराम आधीं सोडी बाण ॥ सवेंचि शर सोडी लक्ष्मण ॥ त्यामागें भरत शत्रुघ्न ॥ भेदित संधान तैसेंचि ॥६४॥

दुरून पाहे दशरथ वीर ॥ चौघे एकदांच टाकिती शर ॥ असुरप्रतिमा करोनि थोर ॥ शिर त्यांचें उडविती ॥६५॥

वेदांतींच्या दिव्य श्रुती ॥ सर्वांवरिष्ठ जेंवी गर्जती ॥ तैसे बाण सोडी रघुपती ॥ अचुक आणि चपळत्वें ॥६६॥

असो चौघांचें मौंजीबंधन ॥ गुरु वसिष्ठातें पुसोन ॥ मेळवूनि अपार ब्राह्मण ॥ अजनंदन करिता जाहला ॥६७॥

श्रीरामाचा व्रतबंधन होत ॥ अष्अमा सिद्धि तेथें राबत ॥ चारी दिवसपर्यंत ॥ न्यून पदार्थ नसे कांहीं ॥६८॥

यज्ञभोक्ता रघुनाथ ॥ त्यांस ब्राह्मण घालिती यज्ञोपवीत ॥ गायत्री मंत्र श्रीराम जपत ॥ वेदवंद्य महाराज जो ॥६९॥

ऐसें जाहलिया व्रतबंधन ॥ वसिष्ठापाशीं अनुदिन ॥ चहूं वेदांचें अध्ययन ॥ केलें संपूर्ण चौघांहीं ॥७०॥

ज्यासी वर्णितां वेद झाले वेडे ॥ तो श्रीराम गुरूपाशीं वेद पढे ॥ अध्ययन सांगतां सांकडे ॥ गुरूसी न पडे सर्वथा ॥७१॥

यापरी द्वादश वर्षे तत्वतां ॥ संपूर्ण जाहलीं रघुनाथा ॥ मग पुसोनि वसिष्ठदशरथां ॥ श्रीराम तीर्था निघाला ॥७२॥

ब्रह्मचर्य तीर्थाटन ॥ करावें हें शास्त्रप्रमाण ॥ हें जाणोनि रघुनंदन ॥ तीर्थाटणासी निघाला ॥७३॥

तीर्थाटण चौघेजण ॥ निघालें सवें अपार सैन्य ॥ सवें दीधला सुमंत प्रधान ॥ असंख्य धन वांटावया ॥७४॥

सवत्स गायींचे भार ॥ नानावस्त्रें अलंकार ॥ तीर्थी वांटी श्रीरघुवीर ॥ याचकांसी सन्मानें ॥७५॥

ज्या तीर्थाचा महिमा जैसा पूर्ण ॥ श्रीराम करी तैसेंच विधान ॥ ज्याचेनि यकळ तीर्थें पावन ॥ तो रघुनंदन तीर्थे हिंडे ॥७६॥

लोकसंग्रहा कारण ॥ तीर्थें हिंडे रघुनंदन ॥ तीं तीर्थें करा श्रवण ॥ संत श्रोते सर्वही ॥७७॥

काशीविश्र्वेश्र्वर निर्मळ ॥ त्र्यंबक उज्जनी महाकाळ ॥ ओंकार महाबळेश्र्वर जाश्र्वनीळ ॥ बदरीकेदार घृष्णेश्र्वर पैं ॥७८॥

नागनाथ वैजनाथ थोर ॥ मल्लिकार्जुन भीमाशंकर ॥ सोमनाथ रामेश्र्वर ॥ ज्योतिर्लिंगे द्वादश हीं ॥७९॥

अयोध्या मथुरा हरिद्वार ॥ काशी कांची अवंतिका नगर ॥ द्वारावती गोमतीतीर ॥ सप्त पुऱ्या अनुक्रमें ॥८०॥

तीर्थराज मुख्य त्रिवेणी ॥ पंचप्रयाग पुण्यखाणी ॥ ब्रह्म प्रयाग कर्णप्रयाग अघहरणी ॥ गुप्तप्रयाग समर्थ ॥८१॥

देवप्रयाग शिवप्रयाग पापहरण ॥ नैमिषारण्य धर्मारण्य पंचकारण्य ॥ ब्रह्मारण्य वेदारण्य ॥ बदरिकाश्रम पावन तो ॥८२॥

यमुना सरस्वती भागीरथी ॥ गौतमी कृष्णा भीमरथी ॥ तापी नर्मदा भोगावती ॥ प्रवरा पुण्यवती मंदाकिनी ॥८३॥

आनंदवर्धिनी पयोष्णी ॥ पिनाकी तुंगा कल्मषनाशिनी ॥ कृतमाळा कावेरी पयस्विनी ॥ सुवर्णमुखी सुमाळा ॥८४॥

कपिला ताम्रपर्णी शरावती ॥ तुंगभद्रा सोमवती ॥ सावित्री रेवा कुंकुमवती ॥ वेण्या वेदवती मलप्रहरा ॥८५॥

घटप्रहरानंदिनी नलिनी ॥ गंडकी शरयु वैतरणी ॥ सोमनद शिवनद तापहरणी ॥ सोमभद्र नदेश्र्वर ॥८६॥

अरुणा वरुणा प्राची पुरंदरी ॥ वेत्रवती सप्तउरगा कर्णकुमरी ॥ स्वामिकार्तिकी पंचघृताची पृथ्वीवरी ॥ विख्यात प्रवाह ज्यांचे ॥८७॥

वज्रकाळिका श्रमहारिणी ॥ महेंद्रकाळी त्रिशूळ मंत्रवर्धिनी ॥ नीरावती सुरनदी शंखोद्धारिणी ॥ जयंती आणि अहिर्णवी ॥८८॥

नाटकी आणि अलकनंदा ॥ फल्गु सर्वांतका त्रिपदा ॥ शांता बाणनदी सुखदा ॥ अनुक्रमें नद्या सर्वही ॥८९॥

शेषाद्रि आणि ब्रह्माद्रि ॥ मूळपीठ पर्वत सिंहाद्रि ॥ विंध्याद्रि आणि हेमाद्रि ॥ मानससरोवरीं स्नान दान ॥९०॥

अरुणाचळ आनंदवन ॥ कमलालया चिदंबरी पूर्ण ॥ अगस्त्याश्रम पावन ॥ श्रीरंगपट्टण शोभिवंत ॥९१॥

जनार्दन कन्याकुमारी ॥ शिवकांचि विष्णुकांचि सुंदरी ॥ मत्स्यतीर्थ पक्षितीर्थ पृथ्वीवरी ॥ शंखोद्धार वेदोद्धार ॥९२॥

हिरण्यनदी संव्यावट ॥ ब्रह्मावर्त धर्मस्तंभ सुभट ॥ ब्रह्मयोनि पृथूदक वरिष्ठ ॥ कुरुक्षेत्र बिंदुतीर्थ पैं ॥९३॥

धर्मालय कलापग्राम ॥ गंगासागर सिंधुसंगम ॥ कौंडण्यपुर अंबिका परम ॥ प्रेमपूर मार्तंड ॥९४॥

बाळकल्होळ कमलेश्र्वरी ॥ विराटस्वरूपिणी रक्तांबरी ॥ भ्रमरांबिका ज्वाळामुखी सुंदरी ॥ पीतांबरी महाशक्ति ॥९५॥

जोगलादेवी भैरवी ॥ करवीरवासिनी शांभवी ॥ सप्तश़ृंगी महारुद्रा देवी ॥ हिंगुळजा आणि कमळजा ॥९६॥

चांगदेव मोरेश्र्वर ॥ गुप्तकेदार वटेश्र्वर ॥ अक्षय वट कुशतीर्थ पवित्र ॥ त्रिकूटाचळ सुंदर पैं ॥९७॥

हरिहरेश्र्वर नृसिंहपूर ॥ मूळमाधव ज्ञानेश्र्वर ॥ चक्रपाणि कदंब भुलेश्र्वर ॥ जुनाट नागेंद्र गौतमेश्र्वर तो ॥९८॥

सप्तयोजनें कोटेश्र्वर ॥ सिद्धवट धूतपाप रामेश्र्वर ॥ दक्षिणप्रयाग माधवेश्र्वर ॥ पूर्वसागर तीर्थराज ॥९९॥

वैराट पुष्कर महाबळेश्र्वर ॥ धूळखेटक शंकर नारायणपुर ॥ मलयेश्र्वर पांचाळेश्र्वर ॥ सत्यनाथ पूर्णालय ॥१००॥

सिंधुपूर महामुंडेश्र्वर ॥ भीमाशंकर धोपेश्र्वर ॥ सोरटीसोमनाथ लिंग थोर ॥ भीमचंडि पुण्यालयें ॥१॥

शिवकांचि विष्णुकांचि ॥ गोरक्षमठ आश्रम काळ हरती ॥ वेदपुर गया अरुणावती ॥ उडूपी शेषशायी सर्वेश ॥२॥

त्रिपति अहोबळ स्वामी कार्तिक सत्य ॥ सुब्रह्मण्य किष्किंधा मातंग पर्वत ॥ हंपीविरूपाक्ष मूर्तिमंत ॥ पंपासरोवर निर्मळ ॥३॥

चित्रकूट रुक्मकूट लोणार ॥ अंबु अयोध्या महंकापुर ॥ काळचंद्रिका अधोंदय पवित्र ॥ गोकर्ण कृष्णसागर पैं ॥४॥

हरिहर तीर्थ जंबुकेश्र्वर ॥ अनंतशायी विमळेश्र्वर ॥ मथुराविकर्ण प्रभाकर ॥ विश्रांतिवन तपोवन ॥५॥

कुंभकोण मंजरथ ॥ मातुलिंग धूळखेट त्रिविक्रमतीर्थ ॥ मुद्रल मांधाता आंवढ्या नागनाथ ॥ पंढरीक्षेत्र चंद्रभागा ॥६॥

त्रिकोण आणि कर्णमूळ ॥ नागगौर रंगजुगुळ ॥ आशापुरी नेपाळ त्रिमल्ल ॥ मथनकाळेश्र्वर कुशतर्पण ॥७॥

मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर ॥ सीता असीता चिदंबरेश्र्वर ॥ ब्रह्मकटाह हरिद्वार ॥ आदित्यवैश्र्वानर महातीर्थ ॥८॥

ब्रह्मानंद म्हणे श्रीकटाधर ॥ इतुकीं तीर्थें करूनि रघुवीर ॥ अयोध्येसी दीनोद्धार ॥ परतोनि आला गजरेंसीं ॥९॥

वसिष्ठासी साष्टांग नमन ॥ दशरथाचे चरण वंदून ॥ तिघी मातांसी रघुनंदन ॥ करी नमन अभेदत्वें ॥११०॥

तीर्थें करोनि आलिया श्रीराम ॥ सदा विरक्त आणि निष्काम ॥ नावडे लौकिक संभ्रम ॥ वैराग्य पूर्ण बाणलें ॥११॥

षड्रस अन्न उत्तमासन ॥ हास्य विनोद श़ृंगार गायन ॥ नावडे मृगया गमनागमन ॥ एकांतपूर्ण आवडे ॥१२॥

नावडे स्त्रियांसी संभाषण ॥ नेणें कामिनीचें विलोकन ॥ नासाग्रीं दृष्टि ठेवून ॥ आनंदघन डोलत ॥१३॥

याचिप्रकारें तिघे बंधू ॥ महाविरक्त निष्काम साधू ॥ श्रीरामसेवा करितां आनंदू ॥ तिघांसही सर्वदा ॥१४॥

तंव तो प्रतिसृष्टि करणार ॥ सिद्धाश्रमी गाधिजपुत्र ॥ महातपस्वी विश्र्वामित्र ॥ अयोध्येसी पातला ॥१५॥

आला ऐकोनि गाधिसुत ॥ सामोरा धांवे दशरथ ॥ साष्टांग करोनि प्रणिपात ॥ क्षेमालिंगन दीधलें ॥१६॥

दृष्टीं देखोनि ब्राह्मण ॥ जो न उठे करी अपमान ॥ त्याच्या आयुष्या होय खंडण ॥ आलें मरण जवळी त्या ॥१७॥

जो ब्राह्मणासी नेदी अभ्युत्थान ॥ तो दुसरे जन्मीं होय श्र्वान ॥ विघ्नें शोधीत येती त्याचें सदन ॥ कोठें नांदतो म्हणोनियां ॥१८॥

तैसा नव्हे राजा दशरथ ॥ महाराज केवळ ब्राह्मणभक्त ॥ कौशिकाचा धरोनि हात ॥ सिंहासनीं बैसविला ॥१९॥

वस्त्रालंकारादि उपचार ॥ देऊनि पूजिला विश्र्वामित्र ॥ मानसीं भावी अजपुत्र ॥ धन्य दिवस आजिचा ॥१२०॥

ऋषीस म्हणे दशरथ ॥ आजि मज हर्ष वाटे बहुत ॥ तुझे पुरवीन मनोरथ ॥ कांही इच्छित माग आतां ॥२१॥

म्हणोनि केला नमस्कार ॥ मग आशीर्वाद देत विश्र्वामित्र सूर्यवंशभूषण तूं उदार ॥ अनंत कल्याण तुजला हो ॥२२॥

तुष्टि पुष्टि तुजलागीं बहुत ॥ धर्म ऐश्र्वर्यवृद्धि अद्भुत ॥ सार्थकायुष्य सुख समस्त ॥ तुजप्रति हो दशरथा ॥२३॥

विवेकज्ञान समृद्धि बहुत ॥ विप्रविष्णुभक्ति घडो सतत ॥ प्रताप प्रज्ञा यशवंत ॥ सुभद्र अत्यंत तुजलागीं हो ॥२४॥

तव शत्रुक्षय हो कां बहुत ॥ अक्षय कल्याणपद हो कां प्राप्त ॥ भूतदया घडो सतत ॥ कुळवृद्धि बहुत हो कां तूंतें ॥२५॥

चिंतित हो पूर्ण मनोरथ ॥ सर्व अरिष्ट हो कां शांत ॥ सर्वाभीष्ट हो तुज प्राप्त ॥ रविकुलअवतंसा ॥२६॥

निर्दोष यश वाढो बहुत ॥ तव कीर्ति वर्णोत साधुसंत ॥ याचकांचे मनोरथ ॥ पुरोत सर्व तुझेनि ॥२७॥

अनाचारीं नसो आदर ॥ संतभजनीं होईं तूं सादर ॥ माझे आशीर्वाद घेईं ॥ माझें चिंतित कार्य सर्वही ॥ हो तुझेनि समस्त ॥२९॥

मी मागत नाहीं संपत्ति धन ॥ नलगे राज्य सिंहासन ॥ माझा मख मोडिती राक्षस येऊन ॥ देईं रघुनंदन रक्षावया ॥१३०॥

सिद्धि न पावे कदा यज्ञ ॥ मारीच सुबाहु ताटिका येऊन ॥ जाती होमद्रव्यें भक्षून ॥ देईं रघुनंदन रक्षावया ॥३१॥

कुंड वेदिका मोडून ॥ यज्ञपात्रें टाकिती फोडून ॥ मखमंडपासी लाविती अग्न ॥ देईं रघुनंदन रक्षावया ॥३२॥

मनुष्यांचें अस्थिमांस आणून ॥ अकस्मात टाकिती वरून ॥ गिळिले तिहीं असंख्य ब्राह्मण ॥ देईं रघुनंदन रक्षावया ॥३३॥

ऐकोनि ऋषीचा वचनार्थ ॥ भयभीत जाहला दशरथ ॥ वाटे अंगावरी कोसळला पर्वत ॥ कीं विद्युत्पात जाहला ॥३४॥

वाटें हृदयीं खोंचलें तप्त शस्त्र ॥ कीं अकस्मात गेले नेत्र ॥ कीं उभे ठाकले तस्कर ॥ धन हरावया कृपणाचें ॥३५॥

पाहे राजा अधोवदन ॥ कांही न बोले प्रतिवचन ॥ विवेकचातुर्य गेलें हरपोन ॥ भयें करोनि तेधवां ॥३६॥

बोले हळूचि भिवोन ॥ महाराक्षस मोडिती यज्ञ ॥ केवळ बाळ रघुनंदन ॥ राजीवनयन ॥ सुकुमार ॥३७॥

लीलाकार्मुक घेवोनि हातीं ॥ मजपुढें खेळे रघुपति ॥ नाहीं देखिली युद्धरीती ॥ अद्यापवरी श्रीरामें ॥३८॥

धनुविद्येचा अभ्यास ॥ अद्यापि नाहीं श्रीरामास ॥ कोमळ तनु डोळस ॥ कैसा युद्धासी देऊं तूतें ॥३९॥

राज्य संपत्ति गृह धन ॥ सर्व देईन तुजलागून ॥ परी नेदीं मी रघुनंदन ॥ राजीवनयन सुकुमार जो ॥१४०॥

राक्षस मारावया समस्त ॥ मी सेनेसहित येतों तेथ ॥ तुझिया कार्या वेंचीन जीवित ॥ परी रघुनाथ न देववे ॥४१॥

कृपणासी न देववे धन ॥ मीनासी न सोडवे जीवन ॥ तैसा मज न देववे रघुनंदन ॥ युद्धकंदन करावया ॥४२॥

श्रीराम माझें तान्हें अत्यंत ॥ कधीं नेणें उष्णवात ॥ ऐसें बोलतां अश्रुपात ॥ नेत्रीं रायाच्या चालिले ॥४३॥

ऐसें बोलतां अजनंदन ॥ ऋषि जाहला कोपायमान ॥ म्हणे तूं बोलिलासी वचन ॥ इच्छित पूर्ण देईन ऐसें ॥४४॥

म्यां न मागतां निश्र्चित ॥ तूं बोलिलासी माग इच्छित ॥ अरे सूर्यवंशी नृपनाथ ॥ डाग लाविला कुळासी ॥४५॥

येचि वंशी हरिश्र्चंद्र जाण ॥ लटकें साच करोनि स्वप्न ॥ राज्य मज दीधलें दान ॥ घेतलें विकून डोंबाघरीं ॥४६॥

तेचि वंशीं तूं जन्मोन ॥ कैसें असत्य केले वचन ॥ सूर्यवंशासी दूषण ॥ तुझेनि पूर्ण लागलें ॥४७॥

येचि वंशी शिबिराव आपण ॥ कपोतपक्ष्याच्या समसमान ॥ आपुलें मांस तुकिलें पूर्ण ॥ मिथ्या वचन न करीच ॥४८॥

येचि वंशीं रुक्मांगद ॥ एकादशीव्रत साधी शुद्ध ॥ केला पुत्राचा शिरच्छेद ॥ मिथ्या शब्द न करीच ॥४९॥

पैल शेजारीं श्रियाळ ॥ त्यासी दान मागे जाश्र्वनीळ ॥ केला पुत्रवध तात्काळ ॥ सत्वासी चळ होऊं नेदी ॥१५०॥

तूं श्रीरामाचा महिमा नेणसी ॥ हा अवतरला वैकुंठासी ॥ वृत्तांत पुसे वसिष्ठासी ॥ साच कीं मिथ्या असे तो ॥५१॥

जो काळासी शासनकर्ता ॥ जो आदिमायेचा निजभर्ता ॥ जो कमलोद्भवाचा पिता ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५२॥

जें नीलग्रीवाचें ध्यान ॥ जें सनकादिकांचें गुह्य ज्ञान ॥ ज्यासी शरण सहस्रनयन ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५३॥

वेदांतशास्त्रें सर्व निसरून ॥ स्थापिती परब्रह्म निर्गुण ॥ तो हा श्रीराम परिपूर्ण ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५४॥

मीमांसक कर्ममार्ग ॥ ज्याकारणें आचरती सांग ॥ तो हा भक्तहृदयारविंदभृगं ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५५॥

नैयायिक म्हणती जीव अनित्य ॥ ईश्र्वर कर्ता एक सत्य ॥ तो हा जगद्वंद्य रघुनाथ ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५६॥

व्याकरणकार साधिती शब्दार्थ ॥ ज्याच्या नामाचे करिती अनेक अर्थ ॥ तो हा अवतारला वैकुंठनाथ ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५७॥

प्रकृतिपुरुषविभाग ॥ सांख्यशास्त्रीं ज्ञानयोग ॥ तो हा राम अक्षय अभंग ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५८॥

पातंजलशास्त्रीं योगसाधन ॥ तो अष्टांगयोग आचरून ॥ ज्याचें पद पावती निर्वाण ॥ त्यासी बाळक म्हणसी तूं ॥५९॥

आतां कल्याण असो श्रीरामा ॥ मी जातों आपुल्या आश्रमा ॥ उल्लंघोन महाद्वारसीमा ॥ बाहेर गेला गाधिसुत ॥१६०॥

घाबरा जाहला नृपवर ॥ गृहांत जावोनि सत्वर ॥ वसिष्ठासी सांगे समाचार ॥ नमस्कार करोनियां ॥६१॥

म्हणे कोपला कीं गाधिसुत ॥ नेईन म्हणतो रघुनाथ ॥ महाराज तूं गुरु समर्थ ॥ सांग यथार्थ काय करूं ॥६२॥

तुझिया अनुग्रहाचें फळ ॥ महाराज राम तमालनीळ ॥ हा विश्र्वामित्र नव्हे काळ ॥ नेऊं आला राघवातें ॥६३॥

जें मागेल तें यास देईं ॥ समाधान करीं ये समयीं ॥ रामासी जीवदान लवलाहीं ॥ देई आतां गुरुराजा ॥६४॥

मग वसिष्ठ बोले गोष्टी ॥ हा विश्र्वामित्र महाहठी ॥ येणें केली प्रतिसुष्टी ॥ परमेष्ठीस जिंकावया ॥६५॥

येणें लोहपिष्ट भक्षून ॥ साठ सहस्र वर्षें पुरश्र्चरण ॥ केलें गायत्रीचें आराधन ॥ त्रिभुवन भीतसे तयातें ॥६६॥

सदा जवळी धनुष्यबाण ॥ महायोद्धा गाधिनंदन ॥ तात्काळ उग्र शाप देऊन ॥ भस्म करील कुळातें ॥६७॥

तुज सांगतों यथार्थ वचन ॥ त्यास देईं रामलक्ष्मण ॥ भरत आणि शत्रुघ्न ॥ तुजपाशीं असों दे ॥६८॥

ऐसें बोलता गुरुनाथ ॥ दीर्घस्वरें दशरथ रडत ॥ मग हृदयीं धरी ब्रह्मसुत ॥ दशरथासी उठवोनि ॥६९॥

रायाचे मस्तकीं हात हस्त ठेवून ॥ म्हणे रामाकडे पाहें विलोकून ॥ तों शंखचक्रगदामांडित पूर्ण ॥ आदिनारायण देखिला ॥१७०॥

सांगे कानीं मूळ काव्यार्थ ॥ हा अवतरला वैकुंठनाथ ॥ विश्र्वामित्र बोलिला जो जो अर्थ ॥ तो तो यथार्थ दशरथा ॥७१॥

सौमित्र तो भोगींद्रनाथ ॥ ऐकोनि तोषला दशरथ ॥ गुरु म्हणे हे मानव सत्य ॥ सर्वथा नव्हेत राजेंद्रा ॥७२॥

यालागीं रामलक्ष्मण ॥ देईं त्यास पाचारून ॥ शिरीं वंदोनि गुरुचरण ॥ गेला धांवोन तयापाशीं ॥७३॥

करूनि साष्टांग नमन ॥ म्हणे न्या जी रामलक्ष्मण ॥ ऐकोनि आनंदला गाधिनंदन ॥ काय वचन बोलत ॥७४॥

म्हणे मी मागत होतों रघुनंदन ॥ त्वां सवें दीधला लक्ष्मण ॥ माझें भाग्य परिपूर्ण ॥ लाभ द्विगुणित जाहला ॥७५॥

माझे पुण्याचे गिरिवर ॥ मेरूहून वाढले अपार ॥ ते आज फळा आले साचार ॥ रघुवीर प्राप्त जाहला ॥७६॥

विश्र्वामित्र आला वसिष्ठमुनी ॥ सभास्थानीं बैसला ॥७७॥

सभेसी बैसले थोर महंत ॥ आनंदमय जाहला दशरथ ॥ विश्र्वामित्र म्हणे रघुनाथ ॥ मज आतांचि दाविजे ॥७८॥

आजि धन्य माझे नयन ॥ पाहीन श्रीरामाचें वदन ॥ ज्यावरोनि मीनकेतन ॥ कोट्यावधि ओंवाळिजे ॥७९॥

नृप सांगोनि पाठवी रामासी ॥ विश्र्वामित्र आला न्यावयासी ॥ आपण यावें सभेसी ॥ सर्वांसी सुख द्यावया ॥१८०॥

ऐसें ऐकतां त्रिभुवनसुंदर ॥ सभेसी चालिला रघुवीर ॥ विद्युत्प्राय प्रावरण चीर ॥ रुळती पदर मुक्तलग ॥८१॥

निशा संपतां तात्काळ ॥ उदयाचळावरी ये रविमंडळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ सभेमाजीं पातला ॥८२॥

कौसल्याहृदयारविंदभ्रमर ॥ दृष्टीं देखोनि विश्र्वामित्र ॥ करोनियां जयजयकार ॥ भेटावया पुढारला ॥८३॥

विश्र्वामित्राचे चरण ॥ प्रेमें वंदितां रघुनंदन ॥ तों ऋषीनें हस्त धरून ॥ आलिंगनासीं मिसळला ॥८४॥

नीलजीमृतवर्ण रघुवीर ॥ प्रेमें हृदयीं धरी विश्र्वामित्र ॥ म्हणे जन्माचें सार्थक समग्र ॥ आजि जाहलें संपूर्ण ॥८५॥

विश्र्वामित्रासी आलिंगुनी ॥ वसिष्ठा नमी चापपाणी ॥ मग श्रीराम बैसला निजआसनीं ॥ वेदपुराणीं वंद्य जो ॥८६॥

मग श्रीरामासी म्हणे विश्र्वामित्र ॥ माझा क्रतु विध्वंसिती असुर ॥ तुजविण कोण रक्षणार ॥ दुजा न दिसे त्रिभुवनीं ॥८७॥

ऐकोनि विश्र्वामित्राचें वचन ॥ कमळ विकासे मित्र देखोन ॥ तैसा रघुवीर सुहास्यवदन ॥ बोलता झाला ते वेळीं ॥८८॥

ते कौतुककथा सुरस बहुत ॥ ऐकोत आतां साधुसंत ॥ जे कथा ऐकतां समस्त ॥ महापातकें नासती ॥८९॥

जैसें महावेदांतशास्त्र ॥ सर्वांसी मान्य करी पवित्र ॥ तैसा सहावे अध्यायीं साचार ॥ रस अपार ओतिला ॥१९०॥

केवळ जें वेदांतज्ञान ॥ रामासी उपदेशील ब्रह्मनंदन ॥ तें ऐकोत संत सज्जन ॥ आत्मज्ञान सुरस तें ॥९१॥

पुसेल आतां रघुवीर ॥ षष्ठाध्यायीं परम सुंदर ॥ वसिष्ठ ज्ञानाचा सागर ॥ वर्षेल उदार मेघे जैसा ॥९२॥

त्या वसिष्ठगोत्रीं उद्भवला पूर्ण ॥ ब्रह्मानंद स्वामी ज्ञानसंपन्न ॥ कीं वसिष्ठचि आपण ॥ कुळीं आपुल्या अवतरला ॥९३॥

ऐसा महाराज ब्रह्मानंद ॥ तयाचें जें चरणाविंद ॥ तेथें श्रीधर होऊनि मिलिंद ॥ दिव्य आमोद सेवितसे ॥९४॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

॥पंचमोध्याय गोड हा ॥१९५॥

श्रीरामविजयअध्याय वा

॥ श्री गणेशाय नमः ॥

जयजय जदद्वंद्या वेदसारा ॥ अनंगदहनहृदयविहारा ॥ कमलोद्भवजनका परात्परा । अगोचरा निरुपाधिका ॥१॥

इच्छामात्रें प्रचंड ॥ मायेनें रचिलें ब्रह्मांड ॥ चौऱ्यांशीं लक्ष योनि उदंड ॥ जीव आंत भरियेले ॥२॥

ते जीव विसरूनि तूंतें ॥ भुलले देखोनि विषयांतें ॥ म्हणोनी विसरलें निजपदांतें ॥ अहंमतीनें भुलोनियां ॥३॥

शब्दविषय घेतां कानें ॥ कुरंग वेचिला समूळ प्राणें ॥ स्पर्शविषय सेवितां वारणें ॥ अंकुशें आकर्षोनि हिंडविती ॥४॥

रूपविषय देखतां पतंग ॥ करी आपला देहत्याग ॥ रसविषय मीन सवेग ॥ गळ गिळोनि मुके प्राणा ॥५॥

गंधविषयें मिलिंद भुलोन ॥ कमळकोशीं वेंची प्राण ॥ ते पांचहि विषय संपूर्ण ॥ भोगिती जाण मानव हे ॥६॥

तुज विसरोनि श्रीरामा ॥ जीव भुलले देहगेहधनकामा ॥ त्यांसी तारावया पूर्णब्रह्मा ॥ दशरथात्मज जाहलासी ॥७॥

पंचमाध्यायाचे अंती कथा ॥ दशरथें राम दिधला गाधिसुता ॥ यावरी वर्तलें तें तत्वतां ॥ ऐका आतां सावधान ॥८॥

गुरूशी शरण रिघाला रघुनाथ ॥ हे कथा वाल्मीकें कथिली अद्भुत ॥ तो बृहद्वसिष्ठग्रंथ ॥ छत्तीस सहस्र श्र्लोक पैं ॥९॥

समुद्राऐसा थोर ग्रंथ ॥ त्यांतील सार सांगों मुख्यार्थ ॥ जैसें भागीरथींतून तृषार्थ ॥ पाणी सेवी अंजुळीनें ॥१०॥

सागरामाजी बुडी देऊन ॥ काढिती सतेज मुक्ते वेंचून ॥ कीं यायकांसी सांपडे अपार धन ॥ परी यथाशक्ति मोट बांधी ॥११॥

देखिला अन्नाचा पर्वत ॥ परी आपणापुरतेंच घे क्षुधार्त ॥ तैसा बृहद्वासिष्ठग्रंथ ॥ त्यांतील गृह्यार्थ ऐका हो ॥१२॥

वाल्मीकाचीं उच्छिष्ट उत्तरें ॥ तींच परिसा तुम्ही सादरें ॥ श्रोते म्हणती उच्छिष्ट खरें ॥ तरी तेंच कांहो बोलतां ॥१३॥

पराचें उच्छिष्ट अंगिकारा ॥ कदा न करिती श्रोते चतुरा ॥ संदेहधनुष्य घेऊनि थोर ॥ प्रश्र्नाक्षरशर सोडिती ॥१४॥

तों वक्त्यानें स्फूर्तिधनुष्य घेऊन ॥ शास्त्रसंमत टाकोनि बाण ॥ प्रश्र्नाक्षरशर निवारून ॥ संदेहधनुष्य छेदिलें ॥१५॥

वक्ता म्हणे ऐका सावधान ॥ कोणतें उच्छिष्ट घेती सज्जन ॥ तरी तें मधुमक्षिकांचें उच्छिष्ट पूर्ण ॥ मधु आवडे देवांतें ॥१६॥

वत्स आधीं करी दुग्धपान ॥ तें अवश्य घ्यावें न करितां अनुमान ॥ भ्रमर आधीं जाय पुष्प सेवून ॥ परी तें शास्त्रज्ञ अंगिकारिती ॥१७॥

मेघमुखीचें जीवन ॥ ते उच्छिष्ट नव्हे कदा जाण ॥ यागीचा पुरोडाश पूर्ण ॥ उच्छिष्ट कोण म्हणे त्यासी ॥१८॥

गौतमें गोदा आणिली प्रार्थून ॥ तेणें आधीं केलें स्नानपान ॥ व्यासाचें उच्छिष्ट पुराण प्राचीन ॥ उच्छिष्ट पूर्ण नव्हे तें ॥१९॥

विष्णुनैवेद्य पावन ॥ त्यास उच्छिष्ट म्हणेल कोण ॥ वाल्मीककाव्य म्हणोन ॥ उच्छिष्ट नव्हे सर्वथा ॥२०॥

व्याघ्रमृगचमन गहन ॥ सूकरकेश पट्टकुलें जाण ॥ हस्तिदंत गवाश़ृंग पूर्ण ॥ इतकीं ब्राह्मण पवित्र म्हणती ॥२१॥

असो ऐका पूर्वानुसंधान ॥ यागरक्षणार्थ जातां रघुनंदन ॥ कौशिकाप्रति राजीवनयन ॥ बोलता जाहला तेधवां ॥२२॥

श्रीराम म्हणे महाऋषी ॥ मज तुम्ही नेतां युद्धासी ॥ क्षणभंगुरता देहासी ॥ आत्मप्राप्ति नाहीं मातें ॥२३॥

आत्मप्राप्तिविण साधन ॥ जैसे अलंकार गळससरीविण ॥ कीं दीपाविण शून्य सदन ॥ जीवनाविण सरिता जैसी ॥२४॥

कीं प्राणाविण कलेवर ॥ कीं आवडीविण आदर ॥ कीं इंद्रियनिग्रहाविण आचार ॥ अनाचार तोचि पैं ॥२५॥

कीं भा्रताराविण कामिनी ॥ कीं अत्रिसुताविण रजनी ॥ तैसे आत्मप्राप्तीवांचुनी ॥ व्यर्थ प्राणी नाडले ॥२६॥

आत्मप्राप्तीसी कारण ॥ धरावे श्रीगुरूचे चरण ॥ गुरुकृपेविण ज्ञान ॥ कल्पातींही साधेना ॥२७॥

पदार्थ न दिसे नेत्रेंविण ॥ गोड न वाटे जीवनाविण ॥ परिसाविण सुवर्ण ॥ लोहाचे नोहे कल्पांतीं ॥२८॥

जो गुरुसेवेसी सादर ॥ आत्मज्ञान जोडोनि कर ॥ उभा त्यांपुढे निरंतर ॥ अहोरात्र तिष्ठतसे ॥२९॥

गुरुसेवा ज्यासी नावडे ॥ त्याचे ज्ञानाचे पडले किडे ॥ जन्ममरणाचें सांकडें ॥ न सरे त्याचें कल्पांतीं ॥३०॥

ज्यासी नावडे गुरुसेवन ॥ तो जाहला चतुःषष्टिकलाप्रवीण ॥ साही शास्त्रें मुखोद्रत पूर्ण ॥ परी तें भाषण मद्यपियाचें ॥३१॥

तेणें केलें जरी कीर्तन ॥ दावी वरपांगें डोलोन ॥ परी गुरुदास्य नावडे पूर्ण ॥ त्याचें बंधन चुकेना ॥३२॥

जळो जळो त्याचा प्रताप ॥ काय चाटावें कोरडें तप ॥ जैसें विगतधवेचें स्वरूप ॥ यौवन काय जाळावें ॥३३॥

गर्भांधाचे विशाळ नेत्र ॥ अदातयाचें उंच मंदिर ॥ कीं धनलुब्धाचा तत्त्वविचार ॥ जैसें मद्यपियाचें पात्र ॥ श्रोत्रिय न शिवे सर्वथा ॥३४॥

तैसे गुरुकृपेविण जे नर ॥ व्यर्थ नरदेहा आले खर ॥ सदा विषयव्यापारीं सादर ॥ त्यासी आपपर नाठवे ॥३५॥

उत्तम मनुष्यदेह पावोन ॥ तेथें साधावें आत्मज्ञान ॥ ज्ञानहीन ते मूढ पूर्ण ॥ गूढ नरक भोगिती ॥३६॥

रघुपतीचे बोल ऐकुनी ॥ सभासंत सुखावले मनीं ॥ विश्र्वामित्र तेव्हां आनंदोनी ॥ ब्रह्मनंदनाप्रति बोले ॥३७॥

जगद्वंद्य रविकुळभूषण ॥ त्यास उपदेशीं दिव्यज्ञान ॥ जो अनंतब्रह्मांडांची सांठवण ॥ लीलावेषधारक जो ॥३९॥

ते वेळे उठोनि रघुनाथ ॥ जो होय कमलोद्भवाचा तात ॥ तो विसिष्ठासी साष्टांग नमित ॥ शरणागत जाहला असे ॥४०॥

म्हणे तनमनधनेंसी अनन्य ॥ श्रीवसिष्ठा तुज मी शरण ॥ ऐसें ऐकतां ब्रह्मनंदन ॥ हृदयीं धरी राघवातें ॥४१॥

म्हणे जगद्वंद्या श्रीरामा ॥ अवतारपुरुषा परब्रह्मा ॥ तूं सच्चिदानंदघन परमात्मा ॥ तुज मी काय उपदेशूं ॥४२॥

तूं आदिनारायण निष्कलंक ॥ भोगींद्र जाहला तुझा तल्पक ॥ वेदशास्त्रांसी पडले टक ॥ तुझें स्वरूप वर्णितां ॥४३॥

तुझें नाम जपतां सार ॥ शीतळ जाहला अपर्णावर ॥ गुरुमहिमा प्रकटावया साचार ॥ शरण मज आलासी ॥४४॥

देव भक्तांची पूजा करी यथार्थ ॥ याचकांसी राजा दान मागत ॥ सागर जैसा स्तवन करित ॥ सरोवराचें प्रीतीनें ॥४५॥

वाचस्पति मुक्यासी पुसे विचार ॥ दीपप्रकाश इच्छी दिनकर ॥ चकोरांसी म्हणे अत्रिकुमर ॥ मज तृप्त करा तुम्ही ॥४६॥

कल्पतरु दुर्बळासी मागे दान । जलद चातकासी मागे जीवन ॥ चक्रवाकाचें दर्शन ॥ तरणि इच्छी नवले हें ॥४७॥

प्रीतीनें माता बाळकासी म्हणत । मी तुझें स्तनपान करीन सत्य ॥ कीं तृषाक्रांतासी मागत ॥ उदक जैसें जान्हवी ॥४८॥

वनस्पतींस म्हणे वसंत ॥ मज तुम्ही निववा समस्त ॥ तैसा तूं जगद्गुरु रघुनाथ ॥ गुरूसी शरण आलासी ॥४९॥

संतोषोनि ब्रह्मंनंदन ॥ श्रीरामास सन्मुख बैसवून ॥ गुरुसंप्रदाय शास्त्रप्रमाण ॥ महावाक्य दीक्षाविधि ॥५०॥

जो मायानियंता जगद्भूषण ॥ तो वसिष्ठापुढें ओढवी कर्ण ॥ चहूं वेदांचें जीवन ॥ तें महावाक्य ऋृषि सांगे ॥५१॥

वसिष्ठ म्हणे सप्रेम ॥ सर्वद्रष्टा तूं आत्माराम ॥ सर्वव्यापक तूं पूर्णब्रह्म ॥ अतींद्रिय वेगळा ॥५२॥

जगडंबराभास सकळ ॥ हा तुझे मायेचा खेळ ॥ मिथ्याभूत जैसें मृगजळ ॥ साच नव्हे सर्वथा ॥५३॥

तूं अलिप्त सर्वांसी तत्त्वतां ॥ जैसा सर्वांघटीं बिंबला सविता ॥ कीं काष्ठामाजी अग्नि पाहतां ॥ अलिप्त जैसा असोनी ॥५४॥

कीं वाद्यांमाजी ध्वनि उमटती ॥ कीं कंठी राग उठती ॥ परी तेथें असोनि नसती ॥ तैसा सर्वांभूतीं राघवा तूं ॥५५॥

कीं दर्पणींचीं स्वरूपें ॥ दिसती परी मिथ्यारूपें ॥ तैसा रामा तूं विश्र्वरूपें ॥ व्यापोनियां अलिप्त ॥५६॥

बीजामाजी तरुवर ॥ कीं तंतूमाजी वस्त्र ॥ कीं उदकीं तरंग अपार ॥ विश्र्व समग्र तुजमाजी ॥५७॥

अनंत ब्रह्मांडांच्या कोडी ॥ तुझी माया घडी मोडी ॥ जीवांस भुरळ घालोनि पाडी ॥ विषयवर्तीं सर्वदा ॥५८॥

मायेचे अवघे विकार ॥ ते मृगजळाचे दाटले पूर ॥ कीं गंधर्वनगर सविस्तर ॥ रचिलें दिसे परी मिथ्या ॥५९॥

हे वोडंबरीचें लेणें पूर्ण ॥ कीं स्वप्नींचें राज्यसिंहासन ॥ कीं चित्रींचा हुताशन ॥ ज्वाळा अद्भुत दीसती ॥६०॥

कीं दर्पणींचा दिव्य हार ॥ कीं मृगजळामाजी वंध्यापुत्र ॥ शुक्तिकारजताचें करोनि पात्र ॥ रात्रीस मीन धरितसे ॥६१॥

नयनांतील पुतळी ॥ गर्भांधें पदरीं धरिली ॥ कल्पांतविजू गिळिली ॥ मश्यकें केंवि घडे हें ॥६२॥

पांगुळ धांवे अंतराळीं ॥ तेणें आकाशाची साल काढिली ॥ प्रभंजनाची चिंधी फाडिली ॥ साच बोली काय हे ॥६३॥

कीं कुहूचे काळोखें भरिलें ॥ तें दिवा दोहों प्रहरां वाळूं घातलें ॥ कीं उरगाचे पाय बांधिले ॥ सिकतातंतूकरूनियां ॥६४॥

काढोनि दीपाचा रंग ॥ वस्त्रे रंगविली सुरंग कीं वडवानळामाजी काग ॥ खेळती काय घडे हें ॥६५॥

हें सर्व जैसें असत्य ॥ तैशी माया मिथ्याभूत ॥ साच कीं लटकी इत्यर्थ ॥ ब्रह्मादिकां नव्हेचि ॥६६॥

मायेचें परम विंदाण ॥ थोरथोरांसी न कळे पूर्ण ॥ तरी मायेची कथा सांगेन ॥ ऐक सावधान श्रीरामा ॥६७॥

जेणें न्यासशास्त्र निर्मिलें पूर्ण ॥ तो गौतम ऋषि परम प्रवीण ॥ त्याचा शिष्य अति सुजाण ॥ गाधि नाम तयाचें ॥६८॥

त्यास चोहों वेदांचें अध्ययन ॥ षट्शास्त्रीं परम निपुण ॥ तेणें केलें दिव्य अनुष्ठान ॥ जाहला प्रसन्न श्रीविष्णु ॥६९॥

मग बोले इंदिरानाथ ॥ प्रसन्न जाहलों माग इच्छित ॥ यावरी तो ब्राह्मण बोलत ॥ काय तें ऐक श्रीरामा ॥७०॥

गाधि म्हणे हृषीकेशी ॥ मज दावी तुझी माया कैशी ॥ तिणें ठकविलें बहुतांसी ॥ मज वेगेंसी पाहूंदे ॥७१॥

ऐकोनि हांसला नारायण ॥ मायापाश परम दारुण ॥ तोडीं म्हणोनि येती शरण ॥ तूं तीस पाहीन कां म्हणसी ॥७२॥

दिसतें तें अवघें असत्य ॥ हेंचि मायेचें रूप यथार्थ ॥ जैसा दोरावरी सर्प भासत ॥ कीं शुक्तिकेवरी रजत जैसें ॥७३॥

कीं खुंट तोचि चोर ॥ भ्रांतासी भासे साचार ॥ जैसें स्वप्नींचें सैन्य अपार ॥ जागृतींत मिथ्या तें ॥७४॥

गाधि म्हणे वैकुंठराया ॥ तूं मिथ्यारूप सांगसी माया ॥ तरी मार्कंडेयऋषिवर्या ॥ ब्रह्मादिकां भुलविलें ॥७५॥

तरी ते मज क्षणभरी ॥ सर्वोत्तमा दावी नेत्रीं ॥ हांसतसे वैकुंठविहारी ॥ बोल ऐकोन तयाचे ॥७६॥

हरि म्हणे माया देखून ॥ समूळ जासी तूं भुलोन ॥ तुझे कासावीस होतील प्राण ॥ मग कोण सोडवील ॥७७॥

तुझी भ्रंशेल सकळ मति ॥ पडसील महाआवर्ती ॥ मग गाधि म्हणे जगत्पति ॥ वर निश्र्चित देईं मातें ॥७८॥

मी कासावीस जेव्हां होईन ॥ तेव्हां तूं मज आठवण दे येऊन ॥ तुझें करितांचि नामस्मरण ॥ पुढती भेटें ऐसाचि ॥७९॥

अवश्य म्हणोनि जगन्निवास ॥ जाता जाहला स्वस्थानास ॥ कांहीं एक लोटले दिवस ॥ ऐकें सर्वेशा राघवा ॥८०॥

जान्हवीतीरीं अरण्यांत ॥ गाधि राहिला स्त्रियेसहित ॥ एकदां मध्यान्ही आला आदित्य ॥ ऋषि जात स्नानातें ॥८१॥

प्रवेशतां गंगाजीवनीं ॥ मनांत म्हणे माया अझुनी ॥ मज कां न दावी चक्रपाणी ॥ कैशी करणी तयाची ॥८२॥

अघमर्षण करी ब्राह्मण ॥ तों मायेनें मांडिलें विंदाण ॥ गाधीस वाटे आलें मरण ॥ व्यथा दारुण जाहली ॥८३॥

तों पातलें यमदूत ॥ तिहीं प्राण काढिले त्वरित ॥ यमापाशीं मारित ॥ गाधि नेला तेधवां ॥८४॥

तो तेथें यमजाचणी दारुण ॥ कुंभीपाकीं घालिती नेऊन ॥ असिपत्रवनीं हिंडवून ॥ तप्तस्तंभासी बांधिती ॥८५॥

इतुकीं दुःखें विप्र भोगित ॥ परी आपण उभा जान्हवींत ॥ मग तो जन्मला चांडाळयोनींत ॥ कंटज नाम तयाचें ॥८६॥

पंचवीस वर्षेंपर्यंत ॥ स्त्रीपुत्र जाहले बहूत ॥ वाटा पाडोन असंख्यात ॥ द्रव्य अपार जोडिलें ॥८७॥

नानापरीच्या हिंसा करी ॥ गोब्राह्मणांस जीवें मारी ॥ तों तेथें आली महामारी ॥ सर्वही मेलीं कुटुंबींचीं ॥८८॥

बाप माय स्त्री सुत ॥ एकदांचि पावलीं मृत्य ॥ कंटक विचारी मनांत । होऊं विरक्त येथोनियां ॥८९॥

रडे कंटजनाम माहार ॥ आतां न मिळे म्हणे संसार ॥ मग अतीत होऊन दुराचार ॥ देशोदेशीं हिंडतसे ॥९०॥

आला केरळदेशाप्रति ॥ तों तेथींचा मृत्यु पावला नृपति ॥ त्यास नाहीं पुत्र संतति ॥ मग प्रधान करिती विचार ॥९१॥

मग शुंडादंडीं माळ देऊन ॥ श़ृंगारूनि हिंडविती हस्तीण ॥ तंव कंटजाचे कंठीं आणोन ॥ माळ घातली अकस्मात ॥९२॥

सहा वर्षें राज्य करून देख ॥ भ्रष्टविले सकळ लोक ॥ घरीं जेऊं घातले सकळिक ॥ सोयरे केले बहुतचि ॥९३॥

एके दिवशीं तो निर्लज्ज ॥ एकला जात बाहेर कंटज ॥ प्रधानादि सेवक सहज ॥ पाठीं धांवती रायाचे ॥९४॥

अवघियांस दटाविलें रागें ॥ म्हणे येऊं नका मज मागें ॥ प्रधान गुप्त पाहती वेगें ॥ कोठें जातो म्हणोनियां ॥९५॥

तों ते गांवींचे अनामिक ॥ परम उन्मत्त मद्यप्राशक ॥ ते वाटेंसीं भेटले सकळिक ॥ कंटजासी तेधवां ॥९६॥

तिहीं कंटज ओळखिला सत्वरा ॥ म्हणती आमुचा हा सोयरा । येणें लोक भ्रष्टविले एकसरा ॥ नाहीं कळलें कोणासी हें ॥९७॥

त्यांसी कंटज दटावी देखा ॥ म्हणे ही गोष्ट बोलूं नका ॥ नाहीं तरी तुम्हां सकळिकां ॥ शिक्षा करीन साक्षेपें ॥९८॥

तें प्रधानवर्गीं ऐकिलें ॥ म्हणे राज्य समस्त बुडविलें ॥ कंटजासी मारून बाहेर घातलें ॥ मग विचारी बैसलें समस्त ॥९९॥

श्रेष्ठीं काढिला शास्त्रार्थ ॥ घ्यावें देहांतप्रायश्र्चित्त ॥ मग अग्निप्रवेश समस्त ॥ लोक करिती नगरींचे ॥१००॥

प्रधानादि अष्टाधिकारी ॥ स्त्रीपुरुष ते अवसरीं ॥ भस्म जाहले अग्निभीतरीं ॥ बाळें नगरीं उतलीं तैं ॥१॥

ऐसें कंटजें देखिलें ॥ म्हणे थोर पाप मज घडलें ॥ तेणेंहि तेव्हां सरण रचिलें ॥ वरी आपण निजेला ॥२॥

तों अग्निशिखा ते वेळीं ॥ वामंगीं येऊन झगटली ॥ कंटजें हांक फोडिली ॥ उडी घातली खालती ॥३॥

तों इकडे गाधिब्राह्मण ॥ बाहेर निघाला हांक फोडून ॥ फोड आला तरतरोन ॥ वामांगासी देखिला ॥४॥

म्हणे मी गाधिब्राह्मण ॥ जान्हवींत करितां स्नान ॥ करीत असतां अघमर्षण ॥ दुःखें दारुण भोगिलीं ॥५॥

सूर्यसुतें मज गांजिलें ॥ चांडाळयोनींत जन्मविलें ॥ सहा वरुषें राज्य केलें ॥ लोक भ्रष्टविले सर्वही ॥६॥

मृत्यु पावले असंख्य जन ॥ जरी हें असत्य म्हणावें स्वप्न ॥ तरी फोड आला तरतरोन ॥ करी रुदन विप्र तो ॥७॥

विसरला तप अनुष्ठान ॥ नाठवे संध्या वेदाध्ययन ॥ आश्रमासी आला परतोन ॥ चिंतार्णवीं पडिलयेला ॥८॥

स्त्री विनवी भ्रतारालागून ॥ तुमचे वामांगीं कां झोंबला अग्न ॥ तंव तो विलापें ब्राह्मण ॥ म्हणे माझेनि हें न सांगवे ॥९॥

तों गाधीचा गुरुबंधु अकस्मात ॥ आला तीर्थे करित करित गाधि तयासी क्षेम देत ॥ म्हणे कृश कां बहुत जाहलासी ॥११०॥

तेणें सांगितलें वर्तमान ॥ मज एक पाप घडलें दारुण ॥ केरळदेशीं एक नगर संपूर्ण ॥ बाळेंचि तेथें नांदती ॥११॥

एकाचे घरीं म्यां घेतलें अन्न ॥ मग त्यांसी पुसिलें वर्तमान ॥ ते म्हणती कंटज महार येऊन ॥ ग्राम आमचा भ्रष्टविला ॥१२॥

समस्तांचे घेऊन प्राण ॥ मग तो गेला येथून ॥ ऐसें पापी नगर तें पूर्ण ॥ तेथें भोजन घडलें मज ॥१३॥

तो दोष जावया संपूर्ण ॥ द्वादश वर्षें करितों तीर्थाटण ॥ ऐसें तो गुरुबंधु सांगोन ॥ गेला पुढें वाराणसी ॥१४॥

प्रचीत पहावया समस्त ॥ गेला आपण गधि तेथ ॥ तो अवघ्या खुणा यथार्थ ॥ प्रत्यया आल्या सर्वही ॥१५॥

आपण जेथें जन्मला होता महार ॥ तेथेंहीं घेतला समाचार ॥ तंव ते अनामिक सांगती समग्र ॥ कंटज येथेंचि जन्मला ॥१६॥

तेणें सहा वरुषें राज्य करोनी ॥ केरळ नगर भ्रष्टवुनी ॥ मग काळें तोंड घेवोनी ॥ गेला नेणों कोणीकडे ॥१७॥

गाधि आश्रमासी आला परतोन ॥ घेतलें क्षितीवर घालून ॥ म्हणे आतां कैंचें ब्राह्मणपण ॥ गेलों बुडोन रौरवीं ॥१८॥

शोकें कपाळ आदळी क्षितीं ॥ म्हणे मी गौतमशिष्य विख्यात जगतीं ॥ मज हें कैशी घडली गती ॥ कोणासी स्थिति पुसों हे ॥१९॥

असत्य जरी म्हणावें वहिलें ॥ तरी सर्वही प्रत्ययास आलें ॥ जन्मकर्म दुष्कृतफळें ॥ पाहोनि आलों स्ववनयनीं ॥१२०॥

सत्य कीं असत्य पूर्ण ॥ मज कोण सांगेल उकलोन ॥ कोणासी मी जाऊं शरण ॥ कैचें ब्राह्मण्य मज आतां ॥२१॥

म्हणे धांव धांव इंदिरावरा ॥ वैकुंठवासिया करुणाकरा ॥ पतितपावना सर्वेश्र्वरा ॥ राजीवनेत्रा जगद्रुरू ॥२२॥

तात्काळ प्रगटला जगज्जीवन ॥ म्हणे रे गाधि सावधान ॥ माझी माया परम गहन ॥ ब्रह्मादिकां अतर्क्य ॥२३॥

तूं म्हणविशी सर्वज्ञ जाणता ॥ सत्य कीं असत्य माया सांग आतां ॥ बहुत ऋषी तर्क करितां ॥ निर्वाह सर्वथा नव्हेचि ॥२४॥

जे कथिती सदा सर्वदा ज्ञान ॥ सांगती माया लटकी म्हणोन ॥ तेही मायेंत गेले गुंफोन ॥ जाहले दीन सर्वही ॥२५॥

तुज माया दाविली किंचित ॥ पुढें आणिक पाहें अद्भुत ॥ गाधि धांवोनि चरण धरित ॥ सोडवीं मज म्हणे येथुनी ॥२६॥

मग गाधि भगवंतें हृदयीं धरिला ॥ वरदहस्तमस्तकीं ठेविला ॥ निजात्मबोध प्रकट केला ॥ सावध जाहला ब्राह्मण ॥२७॥

जैसा स्वप्न देखतां जागा होय ॥ कीं यामिनीअंतीं उगवे सूर्य ॥ तैसा बोध प्रकटतां मोहभय ॥ विरोन गेलें सर्वही ॥२८॥

असो गाधीचा उद्धार जाहला ॥ आपुले स्वरूपीं मेळविला ॥ हा इतिहास सांगितला ॥ मायेनिमित्त श्रीरामा ॥२९॥

मग बोले रघुनंदन ॥ माया व्हावया काय कारण ॥ स्वरूप निर्विकार निर्गुण ॥ तेथें स्फुरण कां जाहलें ॥१३०॥

पिंड ब्रह्मांड नानायोनी ॥ नानावर्ण नानाखाणी ॥ हे मुळींहून मायेची करणी । मिथ्याभूत सर्वही ॥३१॥

कीं निर्गुणा सगुण लाभलें ॥ अव्यक्त तें व्यक्तीस आलें ॥ अनामास नाम ठेविलें ॥ कां अंग लाविलें अनंगा ॥३२॥

ऐकोन श्रीरामाचा प्रश्र्न ॥ आनंदला ब्रह्मनंदन ॥ म्हणे बारे तूं परिपूर्ण चैतन्यघन ॥ जाणोन प्रश्र्न करितोसी ॥३३॥

रामा तुझेंचि दिव्य ज्ञान ॥ तुजचि सांगतों परतोन ॥ जैसें सुरतरूचें फळ घेऊन ॥ त्यासचि नैवेद्य दाविजे ॥३४॥

कीं कनकाद्रीचें सुवर्ण घेऊन ॥ त्यावरीच अलंकार घातले घडून ॥ कीं क्षीरसिंधूचें दुग्ध घेऊन ॥ त्यासीच समर्पिलें ॥३५॥

कीं सागरींचें उदक मेघ नेती ॥ मागुतीं सरिता आणूनि समर्पिती ॥ तैसा श्रीरामा तुजप्रती ॥ तुझेंच ज्ञान सांगतों ॥३६॥

तरी तुवां केला जो प्रश्र्न ॥ स्वरूपीं कां जाहलें स्फुरण ॥ तरी येविषयीं दृष्टांत सांगेन ॥ ऐक रामा निर्धारें ॥३७॥

जैसा कोणी पुरुष निद्रिस्थ ॥ पहुडला असे चिंतारहित ॥ तो स्वईच्छें होऊन जागृत ॥ कार्य कांहीं आठवी ॥३८॥

कीं समुद्रीं उठे लहरी ॥ तैसी ध्वनि उठे चिदंबरी ॥ मी ब्रह्म म्हणोनि निर्धारीं ॥ हाक थोर जाहली ॥३९॥

एक असतां ब्रह्मानंद ॥ निःशब्दीं उठिला शब्द ॥ ते ध्वनि मायानाम प्रसिद्ध ॥ वेदांतशास्त्र गर्जतसे ॥१४०॥

जिचें नाम मूळप्रकृति ॥ जी आदिपुरुषाची चिच्छक्ति ॥ तिणें शेजे निजवोनि पति ॥ सृष्टिकार्य आरंभिलें ॥१४१॥

येवढें ब्रह्मांड केलें निर्माण ॥ परि पतीस कळों नेदी वर्तमान ॥ ते परम कवटाळीण ॥ नसतींच दैवतें उभीं केलीं ॥४२॥

विधि विष्णु उमाकांत ॥ हीं तिन्ही बाळें जिचे आज्ञेंत ॥ नेत्र उघडोन निश्र्चित ॥ पाहों नेदी स्वरूपाकडे ॥४३॥

ब्रह्मसुखाचें समुद्रांत ॥ बुडाले हे जीव समस्त । परी तेथींची गोडी किंचित ॥ चाखों नेदी कोणातें ॥४४॥

चैतन्य इनेंचि झांकिलें ॥ इने अरूप रूपासी आणिलें ॥ अनंत ब्रह्मांडींचे पुतळे ॥ एक्याचि सूत्रे नाचवी ॥४५॥

इनें निर्गुणास गुण लाविले जाण ॥ अनामासी ठेविर्ले नामकरण ॥ निराकारासी आकारून ॥ जीवित्वासी आणिलें ॥४६॥

हे परमपतिव्रता साचार ॥ पतीस न कळतां जाहली गरोदर ॥ ब्रह्मांड रचिले समग्र ॥ नानाविकारें करूनियां ॥४७॥

नानायोनि विकार भाव ॥ इनें फांसां पाडिले अवघे जीव ॥ गाधीस कैसें दाविलें लाघव ॥ मिथ्या कर्तृत्व नसतेंचि ॥४८॥

कोणी मुरडे स्वरूपाकडे ॥ त्यासी नसतेंचि घाली सांकडें ॥ अथवा स्वर्गसुख रोकडें ॥ पुढें दावून भुलवी कीं ॥४९॥

निजात्मसुखगोडी निःसीम ॥ ती जीवासी केली कडू परम ॥ विषयविषरूप मोहभ्रम ॥ तेथें गोडी आणिली ॥१५०॥

असो ऐशी ते आदिशक्ति ॥ तिनें इच्छा धरिली चित्तीं ॥ तिसीच गुणक्षोभिणी म्हणती ॥ त्रिगुण निश्र्चिती केले इनें ॥५१॥

सत्व रज तम जाण ॥ तेचि विधि विष्णु ईशान ॥ त्रिशक्तिरूपें धरून ॥ तिहीं ठायीं आपण जाहली ॥५२॥

ज्ञानशक्तीच्या आधारेंकरून ॥ ज्ञानपंचक केलें निर्माण ॥ तें अंतःकरणचतुष्टय पूर्ण ॥ तत्वविद म्हणती ते ॥५३॥

क्रियाशक्तीच्या आधारें रजोगुण ॥ प्रसवला तो पंचकें तीन ॥ एक ज्ञानेंद्रियपंचक पूर्ण ॥ कर्मेंद्रियपंचक दुसरें ॥५४॥

तिसरें जाणावें वायुपंचक ॥ आतां तमद्रव्यशक्तिआधारें देख ॥ विषयपंचक निर्मिलें सुरेख ॥ पंचतन्मात्रा म्हणती ज्यातें ॥५५॥

ऐसीं पंचवीस तत्त्वें निःशेष ॥ मग केला परस्परानुप्रवेश ॥ कर्दम करूनि विशेष ॥ ब्रह्मांड हें रचियेलें ॥५६॥

ब्रह्मांड ही पेठ पूर्ण ॥ नाना रीतीं रची कमलासन ॥ चहूं खाणींचीं केणीं आणून ॥ चौऱ्यांशीं लक्ष जीव केले ॥५७॥

ऐसा ब्रह्मा पेठा भरित ॥ विष्णु तयांचा प्रतिपाळ करीत ॥ दहा अवतारांच्या घिरट्या घेत ॥ संकटीं तारित भक्तांतें ॥५८॥

सृष्टींत दोष होतां अपार ॥ परम क्रोधी तो अपर्णावर ॥ तात्काळ करी संहार ॥ टाकी सर्व मोडोनियां ॥५९॥

विराट जें रचिलें ढिसाळ ॥ हें शिवाचें देह स्थूळ ॥ पायांचे तळवे तें पातळ ॥ प्रपद रसातळ जाणिजे ॥१६०॥

याचा सांगतों निर्णय ॥ ज्ञान जेणें प्राप्त होय ॥ सकळ संतांचे समुदाय ॥ ऐकोन बहुत आनंदती ॥६१॥

गुल्फद्वय तें महातळ ॥ पोटरिया जानुयुगुळ ॥ तें तळातळ आणि वितळ ॥ विराटाचें जाण पां ॥६२॥

कटिप्रदेश तें महीतळ जाण ॥ जाण नैऋतयलोक तें गुदस्थान ॥ दक्षप्रजापति तो शिश्र ॥ विराटाचें जाण पां ॥६३॥

जठरामाजी पोकळ ॥ तें हें अवघें नभमंडळ ॥ जठराग्नि तो वडवानळ ॥ महाकल्लोळ धडकतसे ॥६४॥

सप्तसमुद्र उदरीं सकळ ॥ ज्योतिर्लोक तें वक्षःस्थळ ॥ महर्लोक तें कंठनाळ ॥ वदनकमळ जनलोक ॥६५॥

वरुणलोक ते जिह्णा जाण ॥ यमलोक त्या दंतदाढा तीक्ष्ण ॥ अश्र्विनौदेव तें घ्राण ॥ भ्रुकुटिस्थान भूर्लोक ॥६६॥

तपोलोक तें कपाळ ॥ मस्तक ब्रह्मभुवन निर्मळ ॥ वासरमणि तें नेत्र तेजाळ ॥ प्रकाशकल्लोळें ब्रह्मांड भरी ॥६७॥

पातीं उघडी त्या नांव दिवस ॥ झांकितां रात्र म्हणती त्यास ॥ उभयहस्तरूपें अमरेश ॥ कर्तव्य करी सर्वही ॥६८॥

चंद्रमा तयाचें मन ॥ वनस्पति रोमावळी पूर्ण ॥ त्वचा ते जाण प्रभंजन ॥ कर्दम पूर्ण मांस तें ॥६९॥

नाडीचक्र गंगा निश्र्चिती ॥ पृष्ठी तिकडे अर्धर्मरीतीं ॥ कनकाचळतो सुमती ॥ शिरोभाग जाणिजे ॥१७०॥

अस्थि त्या जाण पाषाण ॥ फेण ती लाळ ओळखें खूण ॥ दहिंवर ते मूत्र पूर्ण ॥ जळ तें रक्त जाणिजे ॥७१॥

पाषाणगर्भ मज्जा सत्य ॥ पर्जन्य तें शिवाचें रेत ॥ दुर्भिक्ष ती क्षुधा अद्भुत ॥ जलशोष अत्यंत तृषा पूर्ण ॥७२॥

आळस तो शीतकाळ ॥ पर्जन्यकाळ ती निद्रा सबळ ॥ उष्णकाळ तें मैथुन केवळ ॥ वृष्टि व्हावया तावीतसे ॥७३॥

झुंझाट वायु तें धांवणें ॥ वाहाटुळी तयांचें वळण ॥ दशदिशा पसरल्या संपूर्ण ॥ तें पसरण तयाचें ॥७४॥

स्तब्ध वायु तें आकुंचन ॥ उकाडा तो निरोधन ॥ जलवृष्टीची इच्छा काम पूर्ण ॥ सृष्टिसंहारण क्रोध तो ॥७५॥

शोक तो महा अनर्थ ॥ मोह सृष्टिपालन यथार्थ ॥ भय तो मृत्यु ओळख सत्य ॥ विराटपुरुषाचें राघवा ॥७६॥

पतवसन तें अंतःकरण ॥ रमाबंधु तयाचें मन ॥ विरिंचि बुद्धि संपूर्ण ॥ चित्त नारायण जाणिजे ॥७७॥

देवदत्त तो मुख्य प्राण ॥ धनंजय पाताळीं आपण ॥ दिशा तयाचे कर्ण ॥ पावन संपूर्ण त्वचा त्याची ॥७८॥

अग्नि तयाचें वदन ॥ चरण पाताळीं वामन ॥ ऐसा विराटपुरुष संपूर्ण ॥ सप्तावरणमय असे ॥७९॥

भूगोल दशगुणें प्रबळ ॥ बाह्य ओळखें पृथ्वीमंडळ ॥ त्या दशगुणें समुद्रजळ ॥ असंभाव्य पसरलें ॥१८०॥

उदकाचे दशगुण ॥ धडाडीत महाअग्न ॥ त्या दशगुणें प्रभंजन ॥ आवरण पैं जाणिजे ॥८१॥

समीरा दशगुणें साचार ॥ वाड असे हें अंबर ॥ नभा दशगुणें अहंकार ॥ वेष्टिलासे सघन पैं ॥८२॥

अहंकारा दशगुणें निश्र्चित ॥ व्यापिलें असे महतत्त्व ॥ त्या दशगुणें अद्भुत ॥ माया आवरण शेवटीं ॥८३॥

मायेपलीकडे जें उरलें जाण ॥ तें केवळ स्वरूप निर्वाण ॥ तें इतुकें तितुकें थोर लहान ॥ व्यक्तिवर्ण नाहीं तेथें ॥८४॥

ऐसा मायेचा खेळ अचाट ॥ आतां ऐके इचा शेवट ॥ पंचप्रळय स्पष्ट ॥ वेदांतशास्त्रीं निवडिले ॥८५॥

पिंडीं नित्यप्रळय संपूर्ण ॥ निद्रा म्हणती तयालागून ॥ तत्त्वांसमवेत स्थूळलिंगदेह जाण ॥ बुडोन जाय निद्रार्णवीं ॥८६॥

हा नित्यप्रळय जाण ॥ आतां महाप्रळय तें मरण ॥ जाय स्थूळदेह संहारून ॥ सर्व जन देखती ॥८७॥

आतां ब्रह्मांडीचा प्रळय निश्र्चित ॥ चारी युगें सह्त्र वेळां जात ॥ तोंवरी ब्रह्मा होय निद्रिस्थ ॥ मग राहतो सृष्टिक्रम ॥८८॥

अवघी सृष्टि जाय संहारुनी ॥ सर्व जळमय होय ते क्षणीं ॥ बत्तीस लक्ष गांव चढे पाणी ॥ जाय बुडोनी ब्रह्मांड ॥८९॥

सप्तचिरंजीव बुडोन जात ॥ सत्यलोकीं पाणी आदळत ॥ तेव्हां वटप्रत्रशायी भगवंत ॥ ब्रह्मा निद्रिस्थ नाभिकमळीं ॥१९०॥

मग कमलोद्भव होय जागृत ॥ जळ आटोनि समस्त ॥ यथापूर्वक कल्प येत ॥ वेद निश्र्चित बोल तसे ॥९१॥

पूर्विल्यासारखें होय सकळ ॥ मागुती अवतार धरी घननीळ ॥ अवतार चरित्र सकळ ॥ पूर्विल्याऐसें दावित ॥९२॥

हा नित्यप्रळय संपूर्ण ॥ आतां महाप्रळय ऐक दारुण ॥ आधीं शतसंवत्सर घन ॥ न वर्षेंचि कदापि ॥९३॥

तेणें जीवसृष्टीचा संहार ॥ सवेंच उगवती द्वादश मित्र ॥ वडनावळ तो महातीव्र ॥ भूमंडल जाळीत पैं ॥९४॥

तापतांचि उर्वीमंडळ ॥ भोगींद्रमुखींचे निघती ज्वाळ ॥ तेणें सप्तपाताळ सकळ ॥ भस्म होती एकदांचि ॥९५॥

मग शतसंवत्सरपर्यंत ॥ शुंडाधारी मेघ वर्षत ॥ जैसी जळगार जळीं विरत ॥ जगती समस्त वितळे तेविं ॥९६॥

उपरी महातेज अग्न ॥ जळ शोष्ज्ञी न लागतां क्षण ॥ तया तेजासी प्रभंजन ॥ टाकील ग्रासून क्षणमात्रें ॥९७॥

मग तो अद्भुत अनिळ ॥ क्षणें गिळील निराळ ॥ त्या गगनासी समूळ ॥ तमोगुण ग्रासील पैं ॥९८॥

तमासी ग्रासील रजोगुण ॥ रज सत्वीं होईन लीन ॥ सत्वास महतत्त्व मिळोन ॥ समरसेल मायेंत ॥९९॥

माया होय स्वरूपीं लीन ॥ स्वरूप स्वरूपीं समाधान ॥ जे ब्रह्मानंद परिपूर्ण ॥ बोलतां मौन वेदशास्त्रां ॥२००॥

निर्गुण निर्विकार निरूपण ॥ पूर्ण शांति योगक्षेम ॥ असतां पूर्ण जाहले निःसीम ॥ केला क्रम विस्मयें ॥१॥

तें तूं स्वरूप निर्वाण ॥ राघवा नटलासि परिपूर्ण ॥ सच्चिदानंद सत्य जाण ॥ हेंहि बोलणें न साहे ॥२॥

आटोनि सर्व अलंकार ॥ एकरस जाहला निर्विकार ॥ आटलें पिंडब्रह्मांड समग्र ॥ तोचि तूं साचार श्रीरामा ॥३॥

कैचें कैलास ॥ लोपला अवघा मायाविलास ॥ शेषशायी जगन्निवास ॥ हाही भास मावळला ॥४॥

वटपत्रशायी सर्वेश्र्वर ॥ हे नित्यकल्पींची गोष्ट साचार ॥ ब्रह्मा विष्णु महेश्र्वर ॥ स्वस्वरूपीं मिळाले ॥५॥

उरलें निर्विकार स्वरूप ॥ तें तूं राघवा निर्विकल्प ॥ अच्छेद्य अभेद्य अरूप ॥ आत्माराम परिपूर्ण ॥६॥

स्वरूप निर्धार होतां पूर्ण ॥ श्रीरामें झांकिले नयन ॥ ब्रह्मानंदसागरीं लीन ॥ रघुनंदन जाहला ॥७॥

वसिष्ठही आनंदें डुल्लत ॥ खुंटला बोध राहिली मात ॥ गुरुशिष्य देवभक्त ॥ एकरूप जाहले ॥८॥

विराल्या रघुनाथाच्या शक्ती ॥ स्वस्वरूपीं पावला विश्रांती ॥ वसिष्ठही आत्मस्थितीं ॥ श्रीरघुनाथीं बिंबला ॥९॥

अठरा दिवसपर्यंत ॥ श्रीराम जाहला समाधिस्थ ॥ विसरला अवतारकारणहेत ॥ राम समरसला आत्मरूपीं ॥२१०॥

शरीर जाहलें अचेतन ॥ हृदयीं आकर्षिले प्राण ॥ गजबजिलें दशरथाचें मन ॥ म्हणे अनर्थ पूर्ण जाहला ॥११॥

गजबजिला विश्र्वामित्र ॥ म्हणे काय संपला अवतार ॥ बंदीं पडले सुरवर ॥ कोण सोडवील तयांतें ॥१२॥

आतां कैचें यागरक्षण ॥ तात्काळ दरशथ देईल प्राण ॥ आजि जाहले अष्टादश दिन ॥ रघुनंदन सावध नोहे ॥१३॥

ऐकतां निर्वाणज्ञान थोर ॥ राम जाहला निर्विकार ॥ मग वसिष्ठासी विश्र्वामित्र ॥ घाली नमस्कार तेधवां ॥१४॥

म्हणे महाराजा ब्रह्मसुता ॥ सावध करीं रघुनाथा ॥ पुढें अवतारकार्य तत्त्वतां ॥ बहु असे तें जाणसी तूं ॥१५॥

मग वसिष्ठ म्हणे श्रीरामा ॥ सावधान होईं मेघश्यामा ॥ चिदानंद पूर्णब्रह्मा ॥ यागरक्षणा आतां जाईंजे ॥१६॥

जाणोनियां स्वरूपातें ॥ सुखें धर्मरीतीं वर्ते ॥ पाळोनियां सज्जनातें ॥ दुष्ट क्षयातें पाववीं ॥१७॥

जैशीं केश नखें आंगीं वाढती ॥ आपुलीं आपणातें रुपती ॥ तीं छेदितां सुख निश्र्चिती ॥ तैसे दुष्टमति वधावे ॥१८॥

समाधि आणि व्युत्थान ॥ दोनी अंतरीं जिरवून ॥ तुर्या उन्मनी वोलांडून ॥ आनंदघन वर्तावें ॥१९॥

तटस्था टाकोनि वेगीं ॥ रामा उघडी समाधि भोगीं ॥ श्रीरामा तूं राजयोगी ॥ सर्व संगीं निःसंग ॥२२०॥

जो आपले ठायीं भ्रमें वर्तत ॥ तया जगही भ्रममय भासत ॥ भ्रमरूप ब्रह्मांड दिसत ॥ भ्रमेंचि मृत्यु जवळी ये ॥२१॥

ईश्र्वराचें स्वरूप निर्वाण ॥ भ्रमें नाकळे जाहला दीन । आपण आहें कोणाचा कोण ॥ भ्रमें पूर्ण नोळखे ॥२२॥

भ्रमेंकरूनि जन्ममरण ॥ भ्रमेंकरून अधःपतन ॥ तो भ्रम गेल्या संपूर्ण ॥ आपणाविण दुजें नसे ॥२३॥

आपण ब्रह्मस्वरूप होतां पूर्ण ॥ ब्रह्मरूप दिसे त्रिभुवन ॥ शत्रु मित्र थोर लहान ॥ ब्रह्मरूप सर्व दिसे ॥२४॥

घागरी मडकीं रांजण ॥ आंत बिंबला चंडकिरण ॥ परी सूर्यासी स्त्रीपुरुष नपुंसकपण ॥ कल्पांतींही घडेना ॥२५॥

सोनें साच लटिके अलंकार ॥ तरंग मिथ्था एक सागर ॥ पट मिथ्या तंतु निर्धार ॥ तैसें चराचर ब्रह्मरूप ॥२६॥

नाना घट एक अंबर ॥ नाना मणि एक सूत्र ॥ नाना मातृका एक ओंकार ॥ ब्रह्म सर्वत्र तैसेंचि ॥२७॥

म्हणोन सुटतां हृदयग्रंथि ॥ सर्व संशया होय निवृत्ति ॥ कर्मींच होय ब्रह्मप्राप्ति ॥ त्रिजगतीं ब्रह्मरूप ॥२८॥

उभय पक्षांचे बळेंकरूनि ॥ विहंगम संचरती गगनीं ॥ तैसें कर्मब्रह्म ऐक्य करूनी ॥ स्वानंदवनीं विचरावें ॥२९॥

जेथें निमाल्या सकळ आधि ॥ श्रीराम पूर्ण तेचि समाधि ॥ तटस्थता हे उपाधि ॥ एकदेशी जाण पां ॥२३०॥

अंतरीं जाणोनि निर्वाण ज्ञान ॥ बाहेर दाविजे भिन्नाभिन्न ॥ अंतरीं बोध परिपूर्ण ॥ बाहेर जडपण दाविजे ॥३१॥

अंतरीं करून पूर्ण त्याग ॥ बाहेर दाविजे लौकिक भाग ॥ अंतरीं होऊनि निःसंग ॥ विषयीं विराग धरावा ॥३२॥

बाहेर लटकेंच कृपणपण ॥ परी अंतरीं समसमान ॥ रामा तोचि साधक पूर्ण ॥ लोकसंगविवर्जित ॥३३॥

जैसा बीजामधूनि वट थोर ॥ निघे अद्भुत पर्वताकार ॥ तैसें आत्मरूपीं चराचर ॥ जाहलें जाणोनि वर्तावें ॥३४॥

तंतू आणि पट पूर्ण ॥ दोघांसी नव्हे वेगळेपण ॥ घट मृत्तिकेसी टाकून ॥ वेगळा नोहे सर्वथा ॥३५॥

तैसें जग आणि जगदीश्र्वर ॥ भिन्न नोहे साचार ॥ हें ज्ञान जाणोनि निर्विकार ॥ वर्तें सदा तूं राघवा ॥३६॥

अविद्या ही विवशी वाड ॥ निजात्मधनासी मध्यें आड ॥ तिचें गुरुकृपें छेदानि बंड ॥ वर्तें अखंड राघवा ॥३७॥

प्रपंचसमुद्र नसतांचि दिसे ॥ गुरुकृपेचें नावेंत बैसें ॥ निवृत्तितटीं समरसें ॥ आत्मप्रकाशेंकरूनिया ॥३८॥

अभ्यासेंविण विद्या सकळा ॥ तात्काळ होती राघवा विकळा ॥ तैसी नोहे ज्ञानकळा ॥ तारी अबळा निजस्पर्शे ॥३९॥

लोहीं झगटतां परिस पूर्ण ॥ मग तें जन्मवरी जाहलें सुवर्ण ॥ तैसें होतां आत्मज्ञान ॥ जन्ममरण त्यांसी कैचें ॥२४०॥

म्हणोन साधक जे सज्ञान ॥ तिहीं प्रतिपाळावें गुरुवचन ॥ सकळ अकार्या टाकून ॥ सन्मार्गेंच वर्तावें ॥४१॥

रामा तूं गुरु म्हणशील कोण ॥ जो तत्त्ववेत्ता अनुभवी पूर्ण ॥ शिष्य व्हावा ज्ञाननिपुण ॥ ऐसी मति जयासी ॥४२॥

साधकीं करावें हेंचि त्वरित ॥ बोधवज्र घेऊन निश्र्चित ॥ जन्ममरण दुःखपर्वत ॥ चूर्ण करूनि टाकावे ॥४३॥

मोक्षतरूचें बीज हें सत्य ॥ अद्वैत ज्ञान क्रियासहित ॥ सदा चालिजे धर्मपंथ ॥ सर्व कुमतें टाकोनियां ॥४४॥

ज्याचें शुद्ध मन तोचि शुचिष्मंत ॥ सद्विवेक वसे तोचि पंडित ॥ जो गुरुभक्तीसी नव्हे रत ॥ तरी विष यथार्थ तोचि प्याला ॥४५॥

कासया ग्रंथ शतसहस्र ॥ मुख्य धर्म तो परोपकार ॥ अधर्म नाम त्या साचार ॥ परपीडा करणें जें ॥४६॥

याकारणें वत्सा रघुनाथा ॥ तूं समाधि ग्रासोनियां आतां ॥ धनुष्य घेऊनियां तत्त्वतां ॥ मखरक्षणा जाइंजे ॥४७॥

ऐकतां सद्रुरूचें वचन ॥ श्रीराम तो सुहास्यवदन ॥ उघडी अमल राजीवनयन ॥ जे कां आकर्ण विकासले ॥४८॥

करूनि सद्रुरूसी नमस्कार ॥ करी प्रदक्षिणा त्रिवार ॥ सद्रद जाहलें अंतर ॥ अष्टभावेंकरोनियां ॥४९॥

मग म्हणे ब्रह्मपुत्र ॥ बारे दावी आतां लीलाचरित्र ॥ ते गुरुआज्ञा राजीवनेत्र ॥ मस्तकीं वंदोनि निघाला ॥२५०॥

दिव्य रथीं बैसला रघुनाथ ॥ सवें कौशिक आणि सुमित्रासुत ॥ लक्षोनि सिद्धाश्रमाचा पंथ ॥ सुमुहूतैंसी चालिला ॥५१॥

दशरथ आणि ब्रह्मसुत ॥ भागीरथीपर्यंत बोळवित ॥ जातां उत्तम शकुन बहुत ॥ श्रीरामासी जाहले ॥५२॥

त्या शकुनांचा करूनि अर्थ ॥ रायासी सांगे विरिंचिसुत ॥ विजयश्रियेसीं रघुनाथ ॥ अयोध्येसी येईल सुखें ॥५३॥

बोळवूनि तेव्हां रघुनाथ ॥ माघारे आले वसिष्ठ दशरथ ॥ पुढें कथा गोड बहूत ॥ अमृताहून विशेषें ॥५४॥

रामविजय वैरागर देख ॥ षष्ठाध्याय हिरा अलोकिक ॥ हृदयपदकीं जडोत सुरेख ॥ संत श्रोते अनुभवीत ॥५५॥

ब्रह्मानंदा रामचंद्रा ॥ श्रीधरवरदा गुणसमुद्रा ॥ हा षष्ठाध्याय रघुवीरा ॥ सदा हृदयीं वसो माझ्या ॥५६॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ षष्ठाध्याय गोड हा ॥२५७॥

॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥ ॥६॥

श्रीरामविजयअध्याय वा

श्रीगणेशाय नमः
चंडकिरणसुकुमंडणा ॥ अमलकमलाक्षा रघुनंदना ॥ जलजोद्भवजनका जगज्जीवना ॥ पतितपावना श्रीरामा ॥१॥

विद्वज्जनमानसमराळा ॥ कामांतकध्येया भक्तवत्सला ॥ अनंतवेषा त्रिभुवनपाळा ॥ दीनदयाळा रघुपते ॥२॥

जयजय अविद्याविपिनदहना ॥ निजभक्तकौसल्यागर्भरत्ना ॥ जगदोद्धारा मुनिजनरंजना ॥ दुर्जनभंजना राघवेशा ॥३॥मागें षष्ठाध्यायीं कथन ॥ वसिष्ठें रामास उपदेशून ॥ मग विश्र्वामित्र चालिला घेऊन ॥ यागरक्षणाचेनि काजें ॥४॥

भागीरथींत करोनि स्नान ॥ कौशिक राम लक्ष्मण ॥ सारोनियां नित्य अनुष्ठान ॥ सत्कर्माचरण वेदोक्त ॥५॥

मग धनुर्वेदयुक्ति नानामंत्र ॥ कोणे समयीं कैसें प्रेरावे अस्त्र ॥ तें रामासी अवघें मंत्रशास्त्र ॥ विश्र्वामित्र उपदेशी ॥६॥

युद्धाच्या नाना युक्ति कळा ॥ विश्र्वामित्रें सांगतांचि सकळा ॥ राघवें आकळिल्या त्या वेळा ॥ जैसा आंवळा करतळींचा ॥७॥

मूर्तिमंत अस्त्रदेवता ॥ रामचरणीं ठेविती माथा ॥ मग हृदयीं प्रवेशती तत्वतां ॥ जळीं जळगार जयापरी ॥८॥

पहावया श्रीरामाचें धैर्यमानस ॥ विश्र्वामित्र म्हणे तया समयास ॥ येणें मार्गे जे गेले सिद्धाश्रमास ॥ ताटिकेनें तयांस भक्षिलें ॥९॥

येणें मार्गे रघुपति ॥ जाऊं नये भय वाटे चित्ती ॥ हा मार्ग चुकवून त्वरितगतीं ॥ जावें सिद्धाश्रमातें ॥१०॥

ऐकतां कौशिकाचें वचन ॥ श्रीराम बोले सुहास्यवदन ॥ जेणें विश्र्वामित्राचे कर्ण ॥ तृप्त होऊन सुखावती ॥११॥

स्वामी तुमचे कृपेंकरूनी ॥ महाकाळ उभाच फोडीन बाणीं ॥ तेथें ताटिकेसी कोण गणी ॥ येच क्षणीं मारीन तीतें ॥१२॥

कौशिकाचे मनीं संशय होता ॥ कीं हीं बाळके केंवीं झुंजतील आतां ॥ त्या संशयाची समूळ वार्ता ॥ रामवचनें निरसली ॥१३॥

मग त्या रथावरी बैसोन ॥ ताटिकेचें हिंदोळिक वन ॥ त्याचि मार्गे तिघेजण ॥ जाते जाहले तेधवां ॥१४॥

वातवेगें जात स्यंदन ॥ कीं अपार भूमि टाकिली क्रमोन ॥ जैसें ऐकतां हरिकीर्तन ॥ पापें खंडोनि भस्म होती ॥१५॥

पुढे देखिलें घोर अरण्य ॥ वृक्ष लागले परम सघन ॥ चालावयासी स्यंदन ॥ मार्ग पुढें फुटेना ॥१६॥

रामासी म्हणे गाधिनंदन ॥ राघवा हेंचि ताटिकारण्य ॥ आतां येईल ती धांवोन ॥ वास काढून मनुष्यांचा ॥१७॥

तों हांक फोडिली अकस्मात ॥ जे ऐकतां दचकेल कृतांत ॥ विश्र्वामित्र जाहला भयभीत ॥ रक्षीं म्हणत राघवा ॥१८॥

उन्तत्त दशसहस्र गजांचें बळ ॥ ऐसी ताटिका परम सबळ ॥ पर्वत सांठवती विशाळ ॥ ऐसें उदर तियेचें ॥१९॥

ते कुंभकर्णाची भगिनी ॥ बहुत विशाळ राक्षसिणी ॥ शतांचीं शतें गो-द्विज धरुनी ॥ दाढेखालीं रगडीतसे ॥२०॥

ताटिका मार्गी जातां सहज ॥ मुखांत घालोनि रगडी द्विज ॥ वनपावोनीं शोधोनि द्विज ॥ नित्य भक्षी साक्षेपें ॥२१॥

प्रेतरक्तें वस्त्रें भरलीं ॥ तींचि आपणाभोंवतीं वेष्टिलीं ॥ मनुष्यशिरें कर्णीं बांधिलीं ॥ बहु दाट वळीनें ॥२२॥

नरशिरांच्या अपार माळा ॥ शोणितें चर्चित रुळती गळां ॥ कपाळीं सिंदुर चर्चिला ॥ बाबरझोटी मोकळिया ॥२३॥

द्वादश गांव पसरलें वदन ॥ पांच गांव लांब एकेक स्तन ॥ अगणित राक्षसी संगें घेऊन ॥ रामावरी लोटली ॥२४॥

सखियांस ताटिका म्हणे तेचि क्षणीं ॥ या पंथें येत मनुष्यांची घाणी ॥ नरमांसाची आजि धणी ॥ तुम्हांस देईन निर्धारें ॥२५॥

विश्र्वामित्र म्हणे चापपाणी ॥ हे वृक्ष विशाळ गेले गगनीं ॥ आंत गर्जतात राक्षसिणी ॥ ताटिकेसहित पाहे पां ॥२६॥

राम काढी कोदंडाची गवसणी ॥ जैसा याज्ञिकें कुंडीचा फुंकिला अग्नी ॥ कीं अकस्मात उगावला वासरमणि ॥ यामिनीअंतीं पूर्वेसी ॥२७॥

तंव सित ओढितां आकर्ण ॥ कडकडाट घोष दारुण ॥ जाहला सवेंच योजिला बाण ॥ प्रळयचफ्ळेसारिखा ॥२८॥

ज्या बाणाचें अर्धचंद्राकार वदन ॥ करी धांवत्या वायूचें खंडण ॥ रामें ओढूनि आकर्ण ॥ बाण सोडिला ते समयीं ॥२९॥

वृक्षांसहित राक्षसिणी ॥ मुख्य ताटिका हृदयापासोनी ॥ छेदोन पाडिली ते क्षणीं ॥ घोष गगनीं न समाये ॥३०॥

तों प्राण जातां राक्षसिणी ॥ ताटिका गर्जली ते क्षणीं ॥ तो घोष विमानीं ऐकोनि ॥ देव सर्व जगबजिले ॥३१॥

म्हणती विजयी विजयी श्रीरघुवीर ॥ वर्षती देव पुष्पांचे संभार ॥ ब्रह्मानंदें विश्र्वामित्र ॥ रामालागीं आलिंगी ॥३२॥

म्हणे रविकुळभूषणा रघुवीरा ॥ राजीवनेत्रा परम सुकुमारा ॥ तुझी धनुर्विद्या रामचंद्रा ॥ आजि म्यां दृष्टीं विलोकिली ॥३३॥

जैसें एकाचि नामेंकरून ॥ कोट्यावधि पापें जाती जळून ॥ तैसें ताटिकासहित हें वन ॥ एकाचि बाणें खंडिलें ॥३४॥

ताटिकेच्या रक्तेंकरूनी ॥ असंभाव्य तेव्हां रंगली मेदिनी ॥ देव दुंदुभि वाजविती गगनीं ॥ आला चापपाणि सिद्धाश्रमा ॥३५॥

जैसा वर्षाकाळीं गंगेचे पूर ॥ तैसे चहूंकडून धांवती ऋषीश्र्वर ॥ समस्तांसी वंदोनि रघुवीर ॥ भेटता जाहला ते काळीं ॥३६॥

यज्ञमंडप शास्त्रप्रमाण ॥ कुंड वेदिका भूमि साधोन ॥ चारी द्वारें अष्टकोन ॥ करिती साधून विप्र तेव्हां ॥३७॥

सकळ समग्री सिद्ध करून ॥ आरंभिला महायज्ञ ॥ श्रीरामासी म्हणे गाधिनंदन ॥ मखरक्षण करीं आतां ॥३८॥

तुवां ताटिका वधिली हा समाचार ॥ ऐकोनि धांवतील रजनीचर ॥ मारीच सुबाहु भयंकर ॥ प्रळय थोर करितील ॥३९॥

यालागीं नरवीरपंचानना ॥ सांभाळीं चहूंकडे रघुनंदना ॥ परम कपटी राक्षस जाणा ॥ पर्वतशिळा टाकितील ॥४०॥

श्रीराम म्हणे महाऋषि ॥ तुम्ही चिंता न करावी मानसीं ॥ शिक्षा लावीन कृतांतासीं ॥ विघ्नें करूं आलिया ॥४१॥

ऐकोनि श्रीरामाचें वचन ॥ उल्हासलें ऋषीचें मन ॥ दीक्षाग्रहणें गाधिनंदन ॥ आरंभ करी यज्ञासी ॥४२॥

जैसा चंद्र वेष्टित तारांगणें ॥ कीं मित्राभोवती जैशीं किरणें ॥ तैसा ऋषिवेष्टित गाधिवदन ॥ कुंडासमीप विराजे ॥४३॥

ओंकारासहित स्वाहाकार ॥ अवदानें टाकिती सत्वर ॥ उठला मंत्रांचा गजर ॥ वषटूकारघोष पैं ॥४४॥

तों अस्ता गेला वासरमणि ॥ दोन प्रहर जाहली रजनी ॥ पिशिताशन आले धांवोनी ॥ ताटिकेच्या कैवारें ॥४५॥

वीस कोटी रजनीचर ॥ मुख्य मारीच सुबाहु असुर ॥ सिद्धाश्रमासमीप सत्वर ॥ हांक फोडित पातले ॥४६॥

हाक ऐकोनि दारुण ॥ भयभीत जाहले ब्राह्मण ॥ गळती हातींची अवदानें ॥ वदनी बोबडी वळतसे ॥४७॥

म्हणती रक्षीं रक्षीं रघुनंदना ॥ नरवीरश्रेष्ठा गोविप्रपाळणा ॥ श्रीराम म्हणे वो ब्राह्मणा ॥ चिंता कांहीं न करावी ॥४८॥

तंव एक म्हणे ब्राह्मण ॥ रक्षणार राम आणि लक्ष्मण ॥ पर्वताकार राक्षस संपूर्ण ॥ वीस कोटी पातले ॥४९॥

एक द्वार हे दोघे रक्षिती ॥ दुज्या द्वारें राक्षस संचारती ॥ आतां कैसी होईल गती ॥ पळावया निश्र्चितीं ठाव नाहीं ॥५०॥

विश्र्वामित्र म्हणे स्वस्थ करा मन ॥ मानव नव्हे रघुनंदन ॥ पुराणपुरुष आदिनारायण ॥ राक्षस वधावया अवतरला ॥५१॥

तों पर्वत आणि पाषाण ॥ यज्ञमंडपावरी पडती येऊन ॥ हाक फोडिती दारुण ॥ मग रघुनंदन काय करी ॥५२॥

कोदंड ओढून आकर्ण ॥ सोडी बाणपाठीं बाण ॥ राक्षसांचीं शिरें करचरण ॥ तटातटां तुटताती ॥५३॥

राक्षस परम अर्तुबळी ॥ ज्यांहीं सुरांचे मुकुट पाडिले तळीं ॥ हाक देती अंतराळीं ॥ यज्ञमंडप वेढिला ॥५४॥

एक उडती अंबरीं ॥ प्रेतें टाकिती यज्ञकुंडावरी ॥ मग रघुत्तम अयोध्याविहारी ॥ सर्वद्वारीं व्यापिला ॥५५॥

जिकडे तिकडे रघुनंदन ॥ चारी द्वारें अष्टकोन ॥ अष्टदिशा व्यापोन ॥ सोडी बाण श्रीराम ॥५६॥

मंडपाचिया कळसावरी ॥ उभा राम कोदंडधारी ॥ बाणांचा पर्जन्य तये अवसरीं ॥ चहूंकडोन पाडितसे ॥५७॥

रामरूपें असंख्यात ॥ यागमंडपाभोंवते वेष्टित ॥ बाणांचे पूर वर्षत ॥ संहार होत असुरांचा ॥५८॥

मंडपावर आणि खालतें ॥ सर्व व्यापिलें रघुनाथें ॥ तीळ ठेवावयापुरतें ॥ रामाविण रितें स्थळ नसे ॥५९॥

तृणीरांतूनि किती निघती शर ॥ शेषासी त्याचा न कळे पार ॥ कीं लेखकापासूनि अक्षरें ॥ किती निघती कळेना ॥६०॥

कीं मुखांतूनि शब्द निघती ॥ त्यांची जैशी न होय गणती ॥ कीं मेघधारा वर्षती ॥ नाहीं गणती तयांची ॥६१॥

महाकवीची पद्यरचना ॥ किती जाहली हें कळेना ॥ कीं कुबेरभांडारींची गणना ॥ कदा न कळे कोणातें ॥६२॥

मेरुपाठारीं रत्नखाणी निश्र्चिती ॥ त्यांतून रत्नें जैशीं निघती ॥ कीं पृथ्वीवर तृणांकुर किती ॥ नाहीं गणती तयांची ॥६३॥

कीं शास्त्रसंमतें अनेकार्थ ॥ असंख्य करिती निपुण पंडित ॥ तैसा रामबाणांसी नाहीं अंत ॥ तूणीर निश्र्चित रिता नोहे ॥६४॥

मेघ समुद्रजळ प्राशितां ॥ परी तो रिता नाहे तत्त्वतां ॥ कीं विष्णुमहिमा वर्णितां ॥ न सरे सर्वथा कल्पांतीं ॥६५॥

तैसा उणा नोहेचि तूणीर ॥ कोट्यानकोटी निघती शर ॥ करीत राक्षसांचा संहार ॥ समरधीर श्रीराम ॥६६॥

जैसी जाहलीया प्रभात ॥ वृक्षाहूनी पक्षी उडती बहुत ॥ तैसीं राक्षसशिरें अकस्मात ॥ आकाशपंथें उसळती ॥६७॥

वीस कोटी राक्षस देख ॥ एकला राम अयोध्यानायक ॥ परी ते मृगेंद्रावरी जंबुक ॥ अपार जैसे उठावले ॥६८॥

कीं दंदशूक मिळोन अपार ॥ धरूं आले खगेश्र्वर ॥ कीं प्रळयाग्नीवरी पतंगभार ॥ विझवावया झेंपावती ॥६९॥

कीं बहुत मिळून खद्योत ॥ धरून आणूं म्हणती आदित्य ॥ कीं शलभ मिळोनि समस्त ॥ महामेरु उचलूं म्हणती ॥७०॥

एकलाचि फरशधर ॥ परी अवनि केली निर्वीर ॥ एकले नृसिंहें संभार ॥ आटिले पूर्वी दैत्यांचे ॥७१॥

असो राक्षसशिरांच्या लाखोल्या ॥ रामें भूलिंगासी समर्पिल्या ॥ मरीच सुबाहु ते वेळां ॥ गदा घेऊन धांविन्नले ॥७२॥

रामें काढिला निर्वाण बाण ॥ ज्या शरमुखीं दैवत सूर्यनारायण ॥ सुबाहुचा कंठ लक्षून ॥ केलें संधान राघवें ॥७३॥

जैसा विहंगम वेगेंकरून ॥ धांवे वृक्षाग्नीचें फळ लक्षून ॥ तैसा सवेग गेला बाण ॥ शिर उडविलें सुबाहुचें ॥७४॥

त्या बाणाचा पिसारा किंचित ॥ मारीचास लागला अकस्मात ॥ त्या शरवातें अद्भुत ॥ मारीच गेला उडोनि पैं ॥७५॥

कीं खगेश्र्वराच्या पक्षफडत्कारीं ॥ अचळ उडोनि जाय दिगंतरी ॥ तैसा मारीच समुद्राभींतरीं ॥ जाऊनिया पडियेला ॥७६॥

परम होऊनियां भ्रमित ॥ लंकेस गेला धाकें पळत ॥ वाटे पाठीसी लागला रघुनाथ ॥ परतोनि पाहात घडिघडी ॥७७॥

लंकेंत राक्षस प्रवेशोन ॥ राक्षसेंद्रातें सांगे वर्तमान ॥ म्हणे मानव नव्हे रघुनंदन ॥ आदिपुरुष अवतरला ॥७८॥

अवघा ऐकोन वृत्तांत ॥ रावण दचकला मनांत ॥ जैसा सुपर्णाचा ऐकतां पुरुषार्थ ॥ सर्प बहुत संतापती ॥७९॥

कीं ऐकोन संतांचें स्तवन ॥ मनांत कष्टी होय दुर्जन ॥ कीं पतिव्रतेचा धर्म परिसोन ॥ व्याभिचारिणी विटती पैं ॥८०॥

असो समस्त आटोनि रजनीचर ॥ सिद्धाश्रमीं रणरंगधीर ॥ रणमंडळी रघुवीर ॥ एकला कैसा शोभला ॥८१॥

जैसा महाकल्पीं सर्व संहारे ॥ मग एकलें परब्रह्म उरे ॥ कीं समस्त लोपोनि नक्षत्रें ॥ एकला दिनकर उगवे जैसा ॥८२॥

कीं शुक्तिकेवेगळें मुक्ताफळ ॥ दिसे जैसें परम तेजाळ ॥ कीं प्रपंच त्यागोनि निर्मळ ॥ योगेश्र्वर विलसे जेंवि ॥८३॥

जैसी रात्र निरसतां उठती जन ॥ तैसे यज्ञमंडपांतूनि उठती ब्राह्मण ॥ भेटती रामास जाऊन ॥ ब्रह्मानंदेंकरोनियां ॥८४॥

जठरीं अन्नपाक होय वेगें ॥ परी गर्भास ढका न लागे ॥ कीं ज्ञानी वेष्टित तापत्रयभोगें ॥ परी अंतर न भंगें सर्वथा ॥८५॥

तैसे यज्ञमंडपासहित विप्र ॥ सघुत्तमें रक्षिले साचार ॥ पूर्ण जाहला मख समग्र ॥ श्रीरघुवीरप्रतापें ॥८६॥

विश्र्वामित्रासी नावरे प्रेमा ॥ म्हणे वत्सा माझिया श्रीरामा ॥ सहस्रवदनास तुझा महिमा ॥ न वर्णवेचि सर्वथा ॥८७॥

कौशिकासी म्हणती ऋषीजन ॥ श्रीराममूर्ति धाकुटी सगुण ॥ पर्वताकार राक्षस संहारून ॥ कैसे क्षणमात्रें टाकिले ॥८८॥

विश्र्वामित्र हास्यवदन ॥ ऋषिप्रति बोले वचन ॥ म्हणे आदित्यमंडळ दिसे लहान ॥ परी पृथ्वीभरि प्रकाश ॥८९॥

धाकुटा दिसे कलशोद्भव ॥ परी उदरीं सांठविला जलार्णव ॥ कीं वामनरूप धरी केशव ॥ परी दोन पाउलें ब्रह्मांड केलें ॥९०॥

दिसे इंद्राचें वज्र लहान ॥ परी पर्वताचें केलें चूर्ण ॥ पंडितहृदयीं बुद्धी सर्षपप्रमाण ॥ परी आब्रह्मभुवन व्यापिलें ॥९१॥

तैसा राम धाकुटा दिसे तुम्हां ॥ परी ब्रह्मादिकां नेणवे महिमा ॥ पुराणपुरुष हा परमात्मा ॥ भक्तरक्षणा अवतरला ॥९२॥

असो भूतावळी पातल्या तेथें ॥ त्यांहीं भक्षिलीं राक्षसप्रेतें ॥ यज्ञमंडपाभोंवते ॥ शुद्ध केलें भूमंडळ ॥९३॥

तों आलें मिथुलेश्र्वराचें पत्र ॥ तें स्वयें वाची विश्र्वामित्र ॥ सवें घेऊन समस्त विप्र ॥ स्वयंवरालागीं येइंजे ॥९४॥

ते दिवशीं बहुत सोहळा ॥ सिद्धाश्रमीं कौशिकें केला ॥ ब्राह्मणभोजन जाहलिया सकळां ॥ वस्त्रें अलंकार दीधले ॥९५॥

जेथें साह्या श्रीराम आपण ॥ तेथें कांहीं न दिसे अपूर्ण ॥ बहुत दक्षिणा देऊनि ब्राह्मण ॥ विश्र्वामित्रें तोषविले ॥९६॥

असो तेव्हां जाहलिया रजनी ॥ कौशिक निजला स्वशयनीं ॥ पुढें रामलक्ष्मण घेऊनी ॥ सुखें करून पहुडला ॥९७॥

साक्षात् शेषनारायण ॥ कौशिक निजला पुढें घेऊन ॥ निद्रा नव्हे ते समाधि पूर्ण ॥ उन्मनी ओंवाळून टाकावी ॥९८॥

हृदयीं न धरितां रघुनाथा ॥ शेजे निजती जे तत्त्वतां ॥ मज गमे ऐसें पाहतां ॥ कीं पशुच केवळ पडियेले ॥९९॥

रामस्मरणेंविण भोजन ॥ जैसें भस्मी घातलें अवदान ॥ तें यज्ञपुरुषासी न अर्पण ॥ वृथा भोजन तैसें तें ॥१००॥

रामप्राप्तीविण कर्म देख ॥ नाशिती कुश मृत्तिका उदक ॥ तरी ते पिशाच नर ओळख ॥ भुलले मूर्ख जाणिजे ॥१॥

श्रीरामप्राप्तीवीण ज्ञान ॥ त्याचें नांव म्हणिजे अज्ञान ॥ विद्या तेचि अविद्या पूर्ण ॥ धर्म तो अधर्म जाणिजे ॥२॥

असो धन्य भाग्य कोशिकाचें ॥ पुढें निधान श्रीवैकुंठीचें ॥ घेऊन पहुडला साचें ॥ नाहीं चिंतेचें वास्तव्य ॥३॥

निद्रा लागली जों ऋषीस निश्र्चिती ॥ तों जागे जाहले दोघे दशरथी ॥ श्रीराम म्हणे सौमित्राप्रति ॥ परियेसीं एक जिवलगा ॥४॥

आम्ही कधीं जाऊं अयोध्येसी ॥ पाहूं दशरथाचा वदनशशी ॥ बोलतां श्रीरामाचे नेत्रांसी ॥ अश्रु आले तेधवां ॥५॥

तों शयनीं जागा जाहला गाधिसुत ॥ दोघांच्या ऐशा गोष्टी ऐकत ॥ स्फुंदस्फुंदोनि बोले रघुनाथ ॥ श्रीदशरथ देखों कधीं ॥६॥

सकळ रायांचे मुकुट एकसरीं ॥ नमस्कारिती ते अवसरीं ॥ पडती दशरथाचे प्रपदावरी ॥ किणी पडली चरणीं तेणें ॥७॥

ते चरण मी कधी देखेन ॥ दशरथाच्या पादुका घेऊन ॥ दिव्यरत्नीं मंडित पूर्ण ॥ मी उभा ठाकेन कधीं पुढें ॥८॥

जे अयोध्याप्रभूची पट्टराणी ॥ श्रीकौसल्या आमुची जननी ॥ ते अत्यंत कृश होउनी ॥ वाट पाहात असेल कीं ॥९॥

ऐसें विश्र्वामित्रें ऐकिलें ॥ उठोनि रामासी हृदयीं धरिलें ॥ म्हणे बारे जनकाचें पत्र आलें ॥ उदयीं जाऊं मिथुलेसी ॥११०॥

तेथें केवळ विजयश्री सीता ॥ ते तुज माळ घालील रघुनाथा ॥ कौसल्येसहित दशरथा ॥ तेथेंचि तुज भेटवीन ॥११॥

तूं जगद्रुरु श्रीरामचंद्र ॥ दाविसी लौकिक लीलाचरित्र ॥ असो उदयाचळीं प्रकटलें रविचक्र ॥ विप्र सारिती नित्यनेम ॥१२॥

घेऊन ऋषीश्र्वरांचे संभार ॥ श्रीराम आणि सौमित्र ॥ निघता जाहला विश्र्वामित्र ॥ मिथुलापंथे ते काळीं ॥१३॥

चरणचालीं ऋषि चालती ॥ म्हणोनि रथ टाकोनि रघुपति ॥ चरणीं चालतां हो जगती ॥ धन्य जाहलें म्हणतसे ॥१४॥

दोहीं बाहीं विश्र्वामित्र आणि सौमित्र ॥ मध्यें जगद्वंद्य राजीवनेत्र ॥ जो घनश्याम चारुगात्र ॥ कैसा शोभला ते काळीं ॥१५॥

पूर्वीं मंथावया क्षीरसागर ॥ निघाला जेव्हां क्षीराब्धिजावर ॥ ते वेळीं कमलोद्भव आणि उमावर ॥ दोहीं भागीं शोभेल जेंवीं ॥१६॥

कीं शशिमंडळा दोहींकडे लखलखित ॥ शोभती भृगुतनय अंगिरासुत ॥ की शंखचक्र विराजत ॥ श्रीविष्णुच्या दोहीं भागीं ॥१७॥

असो ऐसा चालतां रघुनाथ ॥ ऋषि आपुलाले आश्रम दावित ॥ ठायीं ठायीं बैसवूनि रघुनाथ ॥ पूजा करिती आदरें ॥१८॥

समस्तांचा करित उद्धार ॥ पुढें चालत जगदोद्धार ॥ तों पुढें प्रचंडशिळा दुर्धर ॥ दृष्टीं देखिली राघवें ॥१९॥

तों श्रीरामचरणरज ते वेळे ॥ वायुसंगें पुढें धांविन्नले ॥ शिळेवरी जाऊन पडले ॥ नवल वर्तलें अद्भुत ॥१२०॥

अहल्येसी लाविला चरण ॥ ऐसी कथा वर्णिती कविजन ॥ तरी अहल्या ब्राह्मणकन्या पूर्ण ॥ गौतमाची निजपत्नी ॥२१॥

ब्राह्मणपत्नी ते महासती ॥ तियेतें पाय लावील रघुपति ॥ हें न घडे कल्पांतीं ॥ बरवे संतीं विचारिजे ॥२२॥

असो चरणरजेंचि ते वेळां ॥ कांपों लागली प्रचंड शिळा ॥ विश्र्वामित्राप्रति घनसांवळा ॥ पुसता जाहला वृत्तांत ॥२३॥

म्हणे ऋषि हें नवल वर्तत ॥ थरथरां शिळा कांपत ॥ जैसा चंद्रोदय हळूहळू होत ॥ तैसें दिव्य रूप दिसत स्त्रियेचें ॥२४॥

परम शोभती विद्रुमाघर ॥ जे चंपकवर्ण सुकुमार ॥ उर्वशी रंभा म्हणती सुंदर ॥ परी इजवरोनि ओंवाळिजे ॥२५॥

मस्तकींचें रुळती कबरीभार ॥ वल्कलें वेष्टित सुंदर ॥ मज वाटतें इंद्रादि सुरवर ॥ इचे पोटी जन्मले ॥२६॥

कीं हे आदिभवानीसाचार ॥ आम्हांस आली हो समोर ॥ कीं हे कोणी ऋषिपत्नी सुंदर ॥ निद्रा घेऊन उठली पैं ॥२७॥

कीं पडली होती मूर्च्छा येउनी ॥ कीं निघाली पाताळाहुनी ॥ कीं कोणी टाकिली वधोनी ॥ प्राण येऊन उठली आतां ॥२८॥

कीं केलें शासन ॥ बैसली होती रुसोन ॥ कीं तुमची तपश्र्चर्या संपूर्ण ॥ येणें रूपें आकारली ॥२९॥

मग विश्र्वामित्र म्हणे राजीवनेत्रा ॥ हे ब्रह्मकन्या परम पवित्रा ॥ पतीनें शापितां मदनारिमित्रा ॥ शिळारूप जाहली हे ॥१३०॥

श्रीराम म्हणे महाऋषि ॥ अहल्या शिळा जाहली कैशी ॥ तो वृत्तांत मजपाशीं ॥ कृपा करोनि सांगिजे ॥३१॥

ऋषि म्हणे विरिंचीनें ब्रह्मांड रचिलें ॥ चित्र विचित्ररूप विस्तारिलें ॥ सकळांमाजी विशेष केलें ॥ अहल्येचें स्वरूप पैं ॥३२॥

देखोनि परम सुंदर ॥ तीस मागों येती बहुत वर ॥ कमलोद्भवासी पडला विचार ॥ स्वयंवर थोर मांडिलें ॥३३॥

ब्रह्मा बोले मानसींचा पण ॥ दों प्रहरांत पृथ्वीची प्रदक्षिण ॥ करून येईल पुढें पूर्ण ॥ त्यासी देईन हे अहल्या ॥३४॥

ऐकोन ऐशिया पणासी ॥ धांवो लागले देव ऋषि ॥ यज्ञ गंधर्व तापसी ॥ पृथ्वीप्रदक्षिणेसी चालिले ॥३५॥

त्यांत अवघ्यापुढें अमरपति ॥ ऐरावतारूढ धांवे शीघ्रगती ॥ इतर लोकपाळही धांवती ॥ वाहनीं बैसोनि आपुलाल्या ॥३६॥

एक ऊर्ध्वपंथें वेगें जाती ॥ एक समीरगतीं धांवती ॥ एक मार्गी अडखळून पडती ॥ सवेंचि पळती उठोनियां ॥३७॥

तंब इकडे गौतम मुनि ॥ जान्हवीजीवनीं स्नान करूनि ॥ बाहेर येतां नयनीं ॥ द्विमुखी कपिला देखिली ॥३८

तंव गायत्रीमंत्र जपोन ॥ विधियुक्त केल्या प्रदक्षिणा तीन ॥ नित्यकर्म अनुष्ठान ॥ गौतमें केलें सावकाश ॥३९॥

सत्यलोकास आला परतोन ॥ ज्ञानीं पाहे कमलासन ॥ तों पृथ्वीप्रदक्षिणा तीन ॥ करून आला गौतम मुनि ॥१४०॥

विधि म्हणे धन्य जाहलें ॥ अहल्येचें भाग्य फळासी आलें ॥ तात्काळ दोघांसी लग्न लाविलें ॥ यथाविधि पाणिग्रहण ॥४१॥

तों अवघ्यांपुढें अमरपति ॥ धांवत आला शीघ्रगती ॥ वधूवरें देखोनियां चित्तीं ॥ परम क्रोध संचरला ॥४२॥

विरिंचीस म्हणे सहस्रनयन ॥ वृद्धास केलें कन्यादान ॥ तूं असत्यनाथ पूर्ण ॥ कळों आलें येथोनि आम्हां ॥४३॥

स्रष्टा म्हणे वज्रधरासी ॥ मज असत्य तूं किमर्थ म्हणसी ॥ येणें तीन प्रदक्षिणा केल्या पृथ्वीसी ॥ पाहें मानसीं विचारूनि ॥४४॥

विचार न करितां बोले वचन ॥ सज्जनासी ठेवी नसतें दूषण ॥ वेदवाणी मानी अप्रमाण ॥ शतमूर्खाहूनि मूर्ख तो ॥४५॥

असो इंद्रें द्वेष धरोनि मानसीं ॥ म्हणे एकवेळ भोगीन अहल्येसी ॥ परतोन गेला स्वस्थानासी ॥ खेद अत्यंत पावोनियां ॥४६॥

घेऊनियां अहल्येसी ॥ गौतम आला निजाश्रमासी ॥ बहुत क्रमिलें काळासी ॥ परी इंद्र अहर्निशीं जपतसे ॥४७॥

तंव आलें सूर्यग्रहण ॥ गौतम अहल्या सनन करून ऋषि ध्यानीं बैसला तल्लीन ॥ अहल्या परतोन घरा आली ॥४८॥

ब्रह्मकन्या एकली गृहांत ॥ जाणोनि शक्र आला धांवत ॥ गौतमाचा वेष धरित ॥ सतीलागीं भोगावया ॥४९॥

कपाट देवोन गृहांतरीं ॥ आंत बैसली ब्रह्मकुमारी ॥ तो हा कपटवेषधारी ॥ येऊन द्वारी उभा ठाके ॥१५०॥

म्हणे अहल्ये धांव धांव झडकरी ॥ म्हणोन आंग टाकिलें धरणीवरी ॥ येरी धांवोन आली द्वारीं ॥ हृदयीं धरी तयातें ॥५१॥

कापट्य नेणे महासती ॥ हृदयीं निर्मळ जैशी भागीरथी ॥ परम खेद करी चित्तीं ॥ नयनीं वाहती अश्रुपात ॥५२॥

अहल्येनें वेगें उचलिला ॥ नेऊन मंचकावरी पहुडविला ॥ म्हणे प्रिये प्राण चालिला ॥ अंगसंग देईं वेगें ॥५३॥

येरी म्हणे स्वामी आजि ग्रहण ॥ मध्यान्हास आला चंडकिरण ॥ महाराज तुम्ही शास्त्रज्ञ पूर्ण ॥ विचारून पाहावें ॥५४॥

येरू म्हणे तुज शास्त्रासीं काय कारण ॥ माझें वचन तुज प्रमाण ॥ तंव ते सतीशिरोरत्न ॥ अवश्य म्हणे ते काळीं ॥५५॥

अहल्या इंद्र दोघांजणी ॥ शयन केलें एके शयनीं ॥ तंव गौतम नित्य नेम सारुनी ॥ आश्रमासी पातला ॥५६॥

म्हणे अहल्ये उघडीं वो द्वार ॥ येरी घाबरी सांवरी वस्त्र ॥ म्हणे कोणरे तूं दुराचार ॥ तो म्हणे अमरेंद्र जाण मी ॥५७॥

म्हणे रे अपवित्रा काय केलें ॥ श्रोत्रियाचें पात्र कां स्पर्शिलें ॥ तुझें थोरपण दग्ध जाहलें ॥ कर्म केलें विपरीत ॥५८॥

रति जाहली कीं परिपूर्ण ॥ वेगीं जाय तूं येथून ॥ मग अहल्या कपाट उघडी धांवोन ॥ तंव गौतम दृष्टीं देखिला ॥५९॥

अहल्येस ऋषि कैसा भासला ॥ की कल्पांतींचा सूर्य प्रकटला ॥ कीं अपर्णावर कोपला ॥ तृतीय नेत्र उघडोनियां ॥१६०॥

तो इंद्र पळतां शापिला वेगें ॥ तुझें अंगीं होतील सहस्र भगें ॥ नपुंसक होऊन वागे ॥ परद्वारिया पतिता तूं ॥६१॥

तंव ते अहल्या कामिनी ॥ थरथरां कांपे ऋषीस देखोनि ॥ जैसी महावातें कमळिणी ॥ उलथोन पडों पाहें पैं ॥६२॥

ग्रहणीं काळवंडें वासरमणि ॥ तैशी मुखींची कळा गेली उतरोनि ॥ परम कोपायमान मुनि ॥ अहल्येसी शापित ॥६३॥

हो तुझें शरीर शिळावत ॥ जड होऊन पडो अरण्यांत ॥ साठीसहस्रवर्षेंपर्यंत ॥ राहें मूर्च्छित होऊनियां ॥६४॥

शाप ऐकातांच लवलाहें ॥ धांवोनि धरी ऋषीचे पाय ॥ म्हणे महाराजा विचारूनि पाहे ॥ कापट्य केलें चांडाळें ॥६५॥

जाणोनियां पाकशासन ॥ जरी म्यां दिले असेल भोगदान ॥ तरी माझें शरीर हो शतचूर्ण ॥ ठकविलें पूर्ण पतितानें ॥६६॥

ऋषि म्हणे तुवां जाणोन ॥ शापिला नाहीं पाकशासन ॥ रति झाली कीं परिपूर्ण ॥ जाय म्हणोन बोललीस ॥६७॥

येरी म्हणे नेणोनि घडलें पाप ॥ मज उपजला पश्र्चाताप ॥ तपोनिधी पुण्यरूप ॥ देईं उःशाप सर्वथा ॥६८॥

अहल्या परम दीनवदन ॥ नेत्रीं वाहे अश्रुजीवन ॥ द्रवलें गौतमाचें मन ॥ काय वचन बोलिला ॥६९॥

म्हणे रविकुळीं अवतरेल नारायण ॥ कौसल्यात्मज रघुनंदन ॥ त्याच्या पदरजप्रतापेंकरून ॥ उद्धरोन मज पावसी ॥१७०॥

आतां होईं तूं चंडशिळा ॥ जड पाषाण परम सबळा ॥ वचन ऐकतांचि तात्काळा ॥ अहल्या मूर्च्छित पडियेली ॥७१॥

शरीर पडलें अचेतन ॥ अंग सर्व जाहलें पाषाण ॥ केश नेत्र नासिका स्तन ॥ जाहले कठिणरूप तेव्हां ॥७२॥

प्राण गोळा होऊनि समस्त ॥ आकर्षोंनि राहिली गुप्त ॥ गौतम आपुले दृष्टीं पाहत ॥ पाषाणवत् अहिल्या ॥७३॥

मग आठवूनि अहिल्येचे गुण ॥ गौतमासि आले रुदन ॥ म्हणे अहल्ये ऐसें गुणनिधान ॥ कैसें टाकून जाऊं मी ॥७४॥

तीस नेणोन घडलें पाप ॥ म्यां तर दिधला दीर्घ शाप ॥ आतां करावया जाईन तप ॥ इजसमीप कोणी नाहीं ॥७५॥

येथें सर्प व्याघ्रादि जीवजाती ॥ ईस शिळा देखोन पीडा करिती ॥ चंपककळिका अहल्या सती ॥ परम खेद पावेल ॥७६॥

मग ऋषि शाप देत वनासी ॥ जे जीवमात्र येतील अहल्येपाशीं ॥ ते गतप्राण होतील निश्र्चयेंसी ॥ कोणी शिळेसी न पहावें ॥७७॥

ऐसें ऐकतां शापवचन ॥ एक वृक्ष वेगळे करून ॥ पिपीलिकादि गज व्याघ्र संपूर्ण ॥ गेले पळून ते काळीं ॥७८॥

मग तो महाऋषि गौतम ॥ सतीचा खेद करी परम ॥ पावला तो बद्रिकाश्रम ॥ अनुष्ठान करीत बैसला ॥७९॥

म्हणे कामें नाडिला पाकशासन ॥ मज क्रोधें नागविलें पूर्ण ॥ इंद्र-अहल्येसीं शापितां जाण ॥ तपक्षय जाहला ॥१८०॥

इकडे इंद्र मयूर होऊन अरण्यांत ॥ अनुतापें हिंडे रुदन करित ॥ मग समस्त देवीं अमरनाथ ॥ गोतमापाशीं आणिला ॥८१॥

सुरवरीं बहुत प्रार्थून ॥ केलें इंद्राचें शापमोचन ॥ गौतम बोले प्रसन्नवदन ॥ सहस्रनयन तूं होशील ॥८२॥

शक्र सहस्रनेत्र जाहला ॥ निजपदा तत्काळ पावला ॥ तैपासोन हे अहल्या शिळा ॥ आजवरी जाहली होती ॥८३॥

रामा तुझे पडतां चरणरज ॥ अहल्या दिव्यरूप जाहल सहज ॥ श्रीरामा पहावया तुज ॥ सजीव सतेज जाहली ॥८४॥

कौशिकें सांगतां हें पूर्वकथन ॥ आश्र्चर्य करी रघुनंदन ॥ कौशिकासी प्रतिवचन ॥ काय बोलता जाहला ॥८५

म्यां काय केलें असें आचरण ॥ माझ्या पदरजें उद्धरे पाषाण ॥ कौशिक म्हणे तुझे चरण ॥ त्यांचें वैभव रामा हें ॥८६॥

असो रघुवीर तये काळीं ॥ ऋषिसहित आला तियेजवळी ॥ पदर सांवरोनि उठिली ॥ अहल्या देवी तेधवां ॥८७॥

मस्तकींचे मोकळे कबरीभार ॥ सांवरोनि वीरगुंठी बांधी सत्वर ॥ नेत्रीं न्याहाळित रघुवीर ॥ विधिसुता समोर पातली ॥८८॥

जो दशरथाचा महत्पुण्यमेरु ॥ जो कां लावण्यामृतसागरु ॥ जो जगवंद्य जगद्रुरु ॥ अहल्येनें देखिला ॥८९॥

जो मृडानीपतीचें हृदयरत्न ॥ जो इंद्रादिदेवांचें देवतार्चन ॥ जो जलजोद्भवाचें ध्येय पूर्ण ॥ नारदादिकांचें गुह्य जें ॥१९०॥

जे सनकादिकांची आराध्य मूर्ति ॥ चारी साही वर्णिती ज्याची कीर्ति ॥ तो नेत्रीं देखिला रघुपति ॥ प्रेम चित्तीं न समाये ॥९१॥

अष्टभावें दाटोन ब्रह्मकन्या ॥ साष्टांग नमी राजीवनयना ॥ तो श्रीराम बोले सुवचना ॥ माते ऊठ झडकरीं ॥९२॥

ऐसें ऐकतां ते वेळीं ॥ कमलोद्भवकन्या उठली ॥ जैसी कोकिळा गर्जे वसंतकाळीं ॥ तैसी स्तवन करीतसे ॥९३॥

म्हणे जयजय रामा करुणासमुद्रा ॥ हे दशरथे प्रतापरुद्रा ॥ हे जगद्रुरु श्रीरामचंद्रा ॥ मज चकोरलागीं उदय तुझा ॥९४॥

हे राघवा पुराणपुरुषा ॥ हे जगत्पालका अनंतवेषा ॥ हे कौसल्यात्मजा चंडांशा ॥ निसरली निशा तव उदयीं ॥९५॥

हे विद्वज्जनमानसमांदुसरत्ना ॥ हे ताटिकांतक नरवीर पंचनना ॥ तुझ्या नामप्रतापाची ऐकतां गर्जना ॥ पापवारणा संहार ॥९६॥

श्रीरामा तूं भवरोगवैद्य सुजाण ॥ मात्रा देऊन निजचरणरेण ॥ दोषक्षयरोग दवडोन ॥ अक्षय केलें मजलागीं ॥९७॥

साठसहस्रवर्षेंपर्यंत ॥ अहंदेहभूतें झडपिलें यथार्थ ॥ तूं पंचाक्षरीं रघुनाथ ॥ भूतें समस्त पळालीं ॥९८॥

साठसहस्रवर्षेंवरी ॥ जळतां चिंतेच्या वणव्याभीतरीं ॥ तूं मेघ वर्षतां झडकरी ॥ आजि पूर्ण निवाल्यें ॥९९॥

माझ्या कुरळकेशेंकरून ॥ राघवा झाडीन तुझे चरण ॥ तुजवरून ओंवाळून ॥ काय टाकीन माझी हे ॥२००

असो गौतम पाहे ज्ञानी ॥ तों उद्धरिली आपुली कामिनी ॥ तात्काळ उभा ठाकला येऊनि ॥ वंदी चापपाणि तयातें ॥१॥

श्रीराम उगवतां दिनमणि ॥ हीं चक्रवाकें मिळाली दोन्हीं ॥ असो सकळ ऋषि मिळोनि ॥ शेस भरिती उभयतांची ॥२॥

अहल्या म्हणे हो श्रीरामा ॥ तुज अनंत कल्याण हो सवोत्तमा ॥ हिमनगजामातमनविश्रामा ॥ पूर्णब्रह्मा परात्परा ॥३॥

श्रीरामा सीता स्वयंवरी ॥ तुजचि प्राप्त होईल ते नोवरी ॥ तुजवांचोनि आणिकास न वरी ॥ तुजचि वरील निर्धारें ॥४॥

अहल्या गौतम दोघांजणीं ॥ निजाश्रमीं पूजिला चापपाणी ॥ पुढें श्रीराम आज्ञा घेऊनि ॥ मिथिलेजवळी पातले ॥५॥

शतानंद पुत्र अहल्येचा ॥ तो होय पुरोहित जनकाचा ॥ संग धरोनि श्रीरामाचा ॥ तोही निघाला ते वेळीं ॥६॥

मिथिलेबाहेर उपवनांत ॥ ऋषिसहित राहिला रघुनाथ ॥ तों नगरांतून आली मात ॥ स्वयंवरपणाची तेधवां ॥७॥

उमाकांताचें चाप दारुण ॥ त्यास जो बळिया वाहील गुण ॥ त्यास जानकीपाणिग्रहण ॥ हाचि पण स्वयंवरीं ॥८॥

श्रीराम म्हणे विश्र्वामित्रासी ॥ जानकी जन्म पावली कैसी ॥ पण केला धनुष्यासी ॥ तरी तें चाप कोणाचें ॥९॥

कौशिक सांगे पूर्वकथन ॥ पूर्वीं राजा पद्माक्ष जाण ॥ तेणें कमला करून प्रसन्न ॥ हेंचि वरदान मागीतलें ॥२१०॥

कं माझी कन्या होऊन घरीं ॥ खेळें माझिये निजअंकावरी ॥ मग ते वैकुंठपतीची अंतुरी ॥ काय बोले तेधवां ॥११॥

मी येतां तुझिया मंदिरा ॥ बरें तुज नव्हे नृपवरा ॥ नसतीं विघ्नें येती घरा ॥ विचार बरवा नव्हे हा ॥१२॥

नृप म्हणे निश्र्चयें माझे अंतरीं ॥ माते तूं होय माझी कुमरी ॥ इंदिरा म्हणे स्वामी मुरारी ॥ तया आधीन मी असें ॥१३॥

मग प्रसन्न करूनि श्रीधर ॥ राज पद्माक्ष मागे वर ॥ मज कन्या रमा देईं साचार ॥ ऐकतां मुरहर हांसिन्नला ॥१४॥

मग मातुलिंग फळ दीधलें ॥ तें रायें घरी नवमास ठेविलें ॥ त्यांतून कन्यारत्न निघालें ॥ तेज प्रकटलें असंभाव्य ॥१५॥

वाढतां वाढतां जाहली उपवर ॥ तीस मागों येत बहुत वर ॥ पद्माक्षासी सुख अपार ॥ कन्या सुंदर देखोनि ॥१६॥

ऋृषिगण गंधर्व नृपवर ॥ यक्ष चारण विद्याधर ॥ एकवटले समग्र ॥ पद्माक्षाचे मंदिरीं ॥१७॥

म्हणे पण करीं एक लागवेगीं ॥ कोप चढला पद्माक्षालागीं ॥ म्हणे नभसुनीळता जयाचे आंगीं ॥ त्यास कन्या देईन हे ॥१८॥

ऐकोनि सर्वही कोपले ॥ म्हणती कायरे मिथ्या बोले ॥ एकसरिसे वीर खवळले ॥ युद्ध मांडले असंभाव्य ॥१९॥

अवघ्या राजांसी एकला ॥ पद्माक्ष सप्तदिन भांडला ॥ शेवटीं सर्वी मिळोनि मारिला ॥ पद्माक्षरावो रणामाजीं ॥२२०॥

तों पद्माक्षी ते वेळीं ॥ अग्निकुंडी गुप्त जाहली ॥ पद्माक्षाची संपदा लुटली ॥ ग्राम विध्वंसूनि सर्व गेले ॥२१॥

तया ब्रह्मारण्यामाझारी ॥ पद्माक्षी निघाली कुंडाबाहेरी ॥ रावण विमानरूढ ते अवसरीं ॥ लावण्यसुंदरी देखिली ॥२२॥

देखोन सौंदर्य रूपडें ॥ रावणाची उडी पडे ॥ यरी यज्ञकुंडामाजी दडे ॥ रावणें कुंड विझविलें ॥२३॥

तेथें खणितां बहुत यत्नें ॥ त्यासी सांपडलीं पांच रत्नें ॥ घरा आणिलीं दशाननें ॥ संदुकेमाजी ठेविली ॥२४॥

मग एकांतींचें अवसरीं ॥ रावण सांगे मंदोदरी ॥ अमोल्य रत्नें पृथ्वीवरी ॥ तुजालागीं सुंदरी आणिली ॥२५॥

धांवोनी मंदोदरी उचली पेटी ॥ तंव ते न ढळेचि तये गोरटी ॥ हांसोन दशवक्र शेवटीं ॥ आपण उठे उचलावया ॥२६॥

तंव ती न ढळेचि विसांकरीं ॥ आश्र्चर्य झालें ते अवसरी ॥ प्रधान आणि मंदोदरी ॥ पेटी उघडिती तेधवां ॥२७॥

तंव षण्मासांचे कन्यारत्न ॥ देखता होय दशानन ॥ मंदोदरी म्हणे हें विघ्न ॥ राया घरासी आणिलें ॥२८॥

जो मायार्णवावेगळा ॥ चैतन्यदेही घनसांवळा ॥ त्यासीच हे घालील माळा ॥ इतरां ज्वाळा अग्नीची हे ॥२९॥

इणें निर्दाळिला पद्माक्ष नृपवर ॥ बहु रायांचा केला संहार ॥ ही येथें असतां साचार ॥ लंकापुर नुरेचि ॥२३०॥

दशानना हें परम विघ्न ॥ इजसी आधीं बाहेर घालीं नेऊन ॥ मग बोलाविले सेवक जन ॥ संदुक मस्तकीं दीधली ॥३१॥

पेटी उचलिली ते अवसरीं ॥ हळूच आंतून शब्द करी ॥ मी आणिक येईन लंकापुरीं ॥ रावण सहपरिवारीं वधावया ॥३२॥

ऐकोनियां ऐसें वचन ॥ रावणाचें दचकलें मन ॥ म्हणे इचा आतां वध करीन ॥ मयजा चरण धरी मग ॥३३॥

चरणीं दृढ ठेवोनि माथा ॥ म्हणे पुढील विघ्नें आतांचि कां आणितां ॥ मग शांत केलें पौलस्तिसुता ॥ सकळीं मिळूनि तेधवां ॥३४॥

रावण सांगे सेवकासी ॥ जनकराजा आहे मिथिलेसी ॥ त्याचिया गांवावरी हे विवसी ॥ धाडी नेऊन घाला रे ॥३५॥

मग रातोरातीं तात्काळीं ॥ पेटी पुरिली मिथिलेजवळी ॥ तें शेत कोणे एके काळीं ॥ जनकें ब्राह्मणासी दीधलें ॥३६॥

पद्माक्ष नृप पूर्वींचा पूर्ण ॥ पुन्हां अवतरला तो ब्राह्मण ॥ रायें वेदवक्ता म्हणोन ॥ क्षेत्रदान दीधलें ॥३७॥

सुमुहूर्त पाहोनि सुंदर ॥ ब्राह्मणें जुंपिला नांगर ॥ नांगरादांती परिकर ॥ पेटी अकस्मात लागली ॥३८॥

ब्राह्मण सत्यसन्मार्गी ॥ पेटी उचलिली लागवेगीं ॥ मग दाखविली जनकालागीं ॥ म्हणे राया ठेवणें घेईं आपुलें ॥३९॥

राव म्हणे काय आहे भीतरी ॥ विप्र म्हणे मी नेणें निर्धारीं ॥ जनकराजा आश्र्चर्य करी ॥ पेटी उघडिली तेधवां ॥२४०॥

भोंवतें प्रधान पाहती सकळी ॥ तों पांच वर्षांची कन्या देखिली ॥ असंभाव्य प्रभा पडली ॥ आश्र्चर्य वाटलें सकळिकां ॥४१॥

जनकास उपजला स्नेहो ॥ म्हणे स्वामी हे कन्यारत्न मज द्या हो ॥ ब्राह्मण म्हणे महाबाहो ॥ तुझीच कन्या हे निर्धारें ॥४२॥

ऐसी ते जनकात्मजा सुंदर ॥ सकळ सौंदर्याचें माहेर ॥ जनकरायासी सुख अपार ॥ म्हणे इंदिरासाचार आली हे ॥४३॥

एकवीस वेळां निःक्षत्री ॥ परशुरामें केली धरित्री ॥ सहस्रार्जुन वधोनि क्षणमात्रीं ॥ सूड घेतला रेणुकेचा ॥४४॥

त्र्यंबकधनुष्य घेऊन हातीं ॥ आला जनकाचे गृहाप्रति ॥ षोडाशोपचारें जनक नृपति ॥ भार्गवरामासी पूजितसे ॥४५॥

भोजनास बैसले गृहांतरीं ॥ शिवधनुष्य ठेवूनि बाहेरी ॥ तों जानकीनें ते अवसरीं ॥ घोडें केलें धनुष्याचें ॥४६॥

परशुराम भोजन करूनि ॥ सभेंत बैसला येऊनि ॥तों कोदंड न दिसे नयनीं ॥ भार्गव मनीं क्षोभला ॥४७॥

म्हणे गजभारीं न लोटे धनुष्य ॥ त्याचा कोणीं केला अभिलाष ॥ परशुराम आणि मिथिलेश ॥ द्वाराबाहेर जों आले ॥४८॥

तों कोंदडाचें घोडें करूनि ॥ झ्यां झ्यां म्हणोनि ओढी मेदिनीं ॥ परशुरामें तें देखानि ॥ अंगुळी वदनीं घातली ॥४९॥

पिता देखानि जनकबाळी ॥ कोदंड सांडोनियां पळाली ॥ धनुष्य पडलें ते स्थळीं ॥ तें न ढळेचि कवणातें ॥२५०॥

वीर लाविले प्रचंड ॥ परी नुचलेचि कोदंड ॥ भार्गव म्हणे हें वितंड ॥ सीतवेगळें उचलेना ॥५१॥

मग जनक म्हणे कुमारी ॥ मागुतीं चापातें घोडें करीं ॥ सीतेनें बैसोनि झडकरीं ॥ पूर्वस्थळासी आणिलें ॥५२॥

मग बोले फरशधर ॥ आमुचें अवतारकृत्य जाहलें समग्र ॥ मग तेथें धनुष्य ठेवूनि साचार ॥ जनकाप्रति बोलतसे ॥५३॥

आतां राया हाचि पण ॥ जो या धनुष्या वाहील गुण ॥ त्यासी सीतेसी पाणिग्रहण ॥ हा तूं पण करीं मिथिलेशा ॥५४॥

ऐसें सांगोन जनकासी ॥ भार्गव गेला बदरिकाश्रमासी ॥ विश्र्वामित्र सांगे श्रीरामासी ॥ पूर्व कथा ऐसी हे ॥५५॥

कौशिक म्हणे श्रीरामा ऐके ॥ तुझें चरित्र तुज ठाऊकें ॥ परी बोलविसी आमुच्या मुखें ॥ जाणोनियां सर्वही ॥५६॥

रामविजय ग्रंथ सुंदर ॥ पुढें अष्टमाध्यायीं सीतास्वयंवर ॥ जेथें श्रीराम विजयी साचार ॥ त्याविण आणिका न वरीच ॥५७॥

ब्रह्मानंदा रघुवीरा ॥ कमलोद्भवजनका श्रीधरवरा ॥ पुराणपुरुषा परात्परा ॥ अक्षय कीर्तन दे तुझें ॥२५८॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत श्रोते चतुर ॥२५९॥

सप्तमोऽध्याय गोड हा ॥७॥

श्रीरामविजयअध्याय वा

श्रीगणेशाय नमः ॥

धन्य धन्य तुम्ही संतसज्जन ॥ राममहिमार्णवीचें मीन ॥ त्यांतील अनुभवमुक्तें पूर्ण ॥ दृश्यमान सर्व तुम्ही ॥१॥

राजभांडारींचीं रत्नें बहुत ॥ तीं भांडारीयासी ठाउकी समस्त ॥ कीं मित्रप्रभेचा अंत अद्भुत ॥ अरुण एक जाणे पै ॥२॥

कीं पृथ्वीचें किती वजन ॥ हें भोगींद्र जाणे संपूर्ण ॥ कीं आकाशाचें थोरपण ॥ एक प्रभंजन जाणतसे ॥३॥कवीची पद्यरचना किती ॥ हें एक जाणे सरस्वती ॥ चंद्रामृत वानिजे बहुतीं ॥ परी महिमा जाणती चकोर ॥४॥

कीं प्रेमळ कळा गोड बहुत ॥ हें एक जाणती भोळे भक्त ॥ कीं श्रीरामकथेचा प्रांत ॥ वाल्मीक मुनि जाणतसे ॥५॥

रामनामाचा महिमा अद्भुत ॥ एक जाणे कैलासनाथ ॥ कीं चरणरजाचा प्रताप बहुत ॥ विरिंचितनया जाणे पैं ॥६॥

म्हणोन कथा हे गोड बहुत ॥ एथींचा सुरस सेविती संत ॥ असो सप्तध्यायीं गत कथार्थ ॥ राम मिथिलेसमीप राहिला ॥७॥

देशोदेशींचे जे कां नृप ॥ त्यांसी मूळ धाडी मिथिलाधिप ॥ पृतनेसहित अमूप ॥ राजे लवलाहीं पातले ॥८॥

मूळ धाडिलें दशरथा ॥ परी तो न येचि सर्वथा ॥ कौशिक घेऊन गेला रघुनाथा ॥ वियोगव्यथा थोर त्यासी ॥९॥

माझे कुमर दोघेजण ॥ कौशिक गेला असे घेऊन ॥ माझिया श्रीरामाचें वदन ॥ कैं मी देखेन पूढती ॥१०॥

या वियोगानळेंकरून ॥ श्रावणावरी आहाळे रात्रंदिन ॥ मिथिलेसी न यावया पूर्ण ॥ हेंचि कारण जाणिजे ॥११॥

इकडे ऋषीसहित कौशिक ॥ आला ऐकोन राव जनक ॥ नगराबाहेर तात्काळिक ॥ सामोरा आला समारंभें ॥१२॥

मूर्तिमंत सूर्यनारायण ॥ ऐसा एक एक दिव्य ब्राह्मण ॥ देखतां जनकें लोटांगण ॥ समस्तांसी घातलें ॥१३॥

जनक म्हणे भाग्य अद्भुत ॥ जैं घरा आला साधुसंत ॥ आजि मी जाहलों पुनीत ॥ पूर्वपुण्य फळासी आलें ॥१४॥

नृप सादर पाहे विलोकून ॥ म्हणे श्यामसुंदर दोघेजण ॥ कौशिका हे कोणाचे कोण ॥ सुकुमार सगुण आणिले ॥१५॥

कीं शशी आणि चंडकिरण ॥ कीं वाचस्पति आणि सहस्रनयन ॥ कीं रमापति उमापति दोघेजण ॥ सुवेष धरोनि पातले ॥१६॥

वाटे यांचिया स्वरूपावरून ॥ कोट्यानकोटी मीनकेतन ॥ टाकावे कुरवंडी करून ॥ पाहतां मन उन्मन होय ॥१७॥

जनकासी म्हणे विश्र्वामित्र हे राया दशरथाचे पुत्र ॥ यांचें वर्णावया चरित्र ॥ सहस्रवक्रा शक्ति नोहे ॥१८॥

येणें मार्गीं ताटिका वधून ॥ सिद्धीस पावविला माझा यज्ञ ॥ वीस कोटी पिशिताशन ॥ सुबाहुसहित मारिले ॥१९॥

मार्गी चरणरजेकरूनी ॥ उद्धरिली सरसिजोद्भवनंदिनी ॥ हरकोदंड पहावें नयनीं ॥ म्हणोनि येथें पातले ॥२०॥

साक्षात् शेषनारायण ॥ राया तुवां न करितां प्रयत्न ॥ घरा आले मूळेंविण ॥ सभाग्य पूर्ण तूं एक ॥२१॥

अपचितां जैसा निधि भेटला ॥ चिंतामणि येऊन पुढें पडला ॥ कीं कल्पद्रुम स्वयें आला ॥ गृह शोधित दुर्बळाचें ॥२२॥

कीं निद्रिस्थाचे मुखांत ॥ अकज्ञमरत पडलें अमृत ॥ कीं क्षुधितापुढें धांवत ॥ क्षीरसिंधु पातला ॥२३॥

कीं शास्त्राभ्यासावांचून ॥ भाग्यें जाहलें अपरोक्षज्ञान ॥ कीं मृत्तिका खणितां निधान ॥ अकस्मात लागलें ॥२४॥

जैं भाग्योदयें होय नृपति ॥ तरी घरींच्या दासी सिद्धी होती ॥ कल्पिलें फळ तात्काळ देती ॥ आंगणींचे वृक्ष जे कां ॥२५॥

हातीं कांचमणि धरितां ॥ तो चिंतामणि होय तत्त्वतां ॥ तृणगृहें क्षण न लागतां ॥ सुवर्णमंदिरें पैं होती ॥२६॥

खडाणा गाई दुभती ॥ वैरी तोचि मित्र होती ॥ विशेष प्रकाशे निजममि ॥ राजे पूजिती येऊनि घरा ॥२७॥

समयोचित होय स्फूर्ति ॥ दिगंतरा जाय किर्ति ॥ पदोपदीं निश्र्चितीं ॥ यश जोडे तयांतें ॥२८॥

असो जनकासी म्हणे विश्र्वामित्र ॥ तुझा आजि उदय पावला भाग्यमित्र ॥ घरासी आला स्मरारिमित्र ॥ सकल अमित्रां त्रासक जो ॥२९॥

जनकें करून बहुत आदर ॥ विश्र्वामित्र श्रीराम सौमित्र ॥ निजसभेसी आणोनि सत्वर ॥ मान देऊनि बैसविले ॥३०॥

देशोदेशींचे नृपति ॥ राम पाहोनि आश्र्चर्य करिती ॥ सीता द्यावी हो याप्रति ॥ नोवरा रघुपति साजिरा ॥३१॥

एक म्हणती स्वयंवरीं केला पण ॥ भार्गवचापासी चढवावा गुण ॥ हें कार्य परम कठीण ॥ रामास केंवि आकळे ॥३२॥

मनांत म्हणे जनक नृपवर ॥ जरी जांवयी होईल रघुवीर ॥ तरी माझ्या भाग्यास नाहीं पार ॥ परी पण दुर्धर पुढें असे ॥३३॥

तंव तया मंडपांगणीं ॥ परम चतुर चपळ करिणी ॥ वरी दिव्य चंवरडोल जडितरत्नीं ॥ झळकतसे अत्यंत ॥३४॥

त्यामाजी बैसली जनकबाळा ॥ हातीं घेऊनियां दिव्यमाळा ॥ विलोकित सकळ भूपाळां ॥ ऋृषिवृंदांसहित पैं ॥३५॥

जवळी सखिया सकळ असती ॥ श्र्वेत चामरें वरी ढाळिती ॥ एक क्षणांक्षणां श़ृंगार सांवरिती ॥ विडे देती एक तेथें ॥३६॥

जे त्रिभुवनपतीची मुख्य राणी ॥ आदिमाया प्रणवरूपिणी ॥ जे इच्छामात्रेंकरूनि ॥ ब्रह्मांड हें घडी मोडी ॥३७॥

ब्रह्मादिक बाळें आज्ञेंत ॥ आपले निजगर्भीं पाळित ॥ तिचें स्वरूप लावण्य अद्भुत ॥ कवणालागीं न वर्णवे ॥३८॥

अनंतशक्ति कर जोडोन ॥ जी पुढें ठाकती येऊन ॥ जिनें आदिपुरुषा जागा करून ॥ सगुणत्वासी आणिला ॥३९॥

या ब्रह्मांडमंडपामाझारी ॥ जनकात्मजेऐशी सुंदरी ॥ उपमा द्यावया दुसरी ॥ कोणे अवतारीं नसेचि ॥४०॥

जैसें जांबूनदसुवर्ण तप्त ॥ तैसें सर्वांग दिव्य विराजित ॥ आकर्ण नेत्र विकासित ॥ मुखमृगांक न वर्णवेचि ॥४१॥

मुखीं झळकती दंतपंक्ति ॥ बोलतां जिकडे पडे दीप्ति ॥ पाषाण ते पद्मराग होती ॥ वाटे रत्नें विखुरती बोलतां ॥४२॥

जानकीचे आंगींचा सुवास ॥ भेदोन जाय महदाकाश ॥ जिणें भुलविला आदिपुरुष ॥ आपुल्या स्वरूपविलासें ॥४३॥

पाय ठेवितां धरणीं ॥ पदमुद्रा उमटती जे स्थानीं ॥ तेथें वसंत येऊनि ॥ लोळत भुलोनि सुवासा ॥४४॥

चंद्रसूर्याच्या गाळिल्या ज्योती ॥ तैशीं कर्णपुष्पें अत्यंत झळकती ॥ कर्णीं मुक्तघोस ढाळ देती ॥ कृत्तिकापुंज जैसे कां ॥४५॥

आकर्णपर्यंत विशाळ नयन ॥ माजी विलसे सोगियाचें अंजन ॥ कपाळीं मृगमद रेखिला पूर्ण ॥ वरी बिजवरा झळकतसे ॥४६॥

शीत दाहकत्व सांडोनि ॥ शशांक आणि वासरमणि ॥ सुदा विलसती दोनि ॥ मुक्ताजाळीं गगनीं भगणें जैशीं ॥४७॥

विद्युत्प्राय दिव्यांबर ॥ मुक्तलग चोळी शोभे विचित्र ॥ वरी एकावळी मुक्ताहार ॥ पदकीं अपार तेज फांके ॥४८॥

दशांगुळीं मुद्रिका यंत्राकार ॥ वज्रचुडेमंडित कर ॥ कटिकांचीवरी चालतां धरणीं ॥ जिचिया स्वरूपावरूनी ॥ कोटी अनंग ओंवाळिजे ॥५०

असो ऐशी ते चित्कळा ॥ सुकळ सभा विलोकी डोळां ॥ तो ऋृषिपंक्तिमाजी घनसांवळा ॥ परब्रह्मपुतळा देखिला ॥५१॥

विजयनामें सखीप्रति ॥ सीता म्हणे पाहें ऋषिपंक्ति ॥ त्यांमाजी विलसे जी मूर्ति ॥ माझी प्रिति जडली तेथें ॥५२॥

घनश्याम सुंदर रूपडें ॥ देखतां कामाची मुरकुंडी पडे ॥ सखे मज वर जरी ऐसा जोडे ॥ तरीच धन्य मी संसारीं ॥५३॥

बहुत जन्मपर्यंत ॥ तप केलें असेल जरी अत्यंत ॥ तरीच हा मज होईल कांत ॥ विजये निश्र्चित जाणपां ॥५४॥

नवस करूं कवणाप्रति ॥ कोणती पावेल मज शक्ति ॥ रघुवीर जरी जोडेल पति ॥ तरी त्रिजगतीं धन्य मी ॥५५॥

राजीवनेत्र घनसांवळा ॥ स्वरूपठसा सर्वांत आगळा ॥ आपले हातीं यासी घालीन माळा ॥ मग तो सोहळा न वर्णवे ॥५६॥

तों विश्र्वामित्र म्हणे जनकाप्रति ॥ आतां कोदंड आणावें शीघ्रगती ॥मिळाले येथें सर्व नृपती ॥ जे कां पुरुषार्थीं थोर थोर ॥५७॥

अष्टचक्रशकट प्रचंड ॥ त्यावरी ठेविलें चंडकोदंड ॥ सहस्रवीरांचे दोर्दंड ॥ ओढितां भागले न ढळेचि ॥५८॥

मग गजभार लाविले ॥ रंगमंडपीं ओढून आणिलें ॥ देखतां सर्व राजे दचकले ॥ म्हणती हे नुचले कोणाशीं ॥५९॥

एक म्हणती हें शिवचाप ॥ उचलील ऐसा न दिसे भूप ॥ एकास सुटला चळकंप ॥ गेला बळदर्प गळोनियां ॥६०॥

एक महावीर बोलत ॥ आम्ही कौतुक पाहों आलों येथ ॥ एक म्हणती जनकाचा स्नेह बहुत ॥ म्हणोनि भेटीस पातलों ॥६१॥

जनक सांगे सकळांतें ॥ हें विरूपाक्षें घेऊन स्वहतें ॥ शिक्षा लाविली दक्षातें ॥ सहस्रक्षातें नुचले हें ॥६२॥

ऐसिया चापासी उचलोन ॥ जो राजेंद्र वाहील गुण ॥ त्यासी हे जनकी गुणनिधान ॥ माळ घालील स्वहस्तें ॥६३॥

तटस्थ पाहती सकळ वीर ॥ कोणी न देती प्रत्त्युतर ॥ कोणी सांवरोनियां धीर ॥ चाप उचलूं भाविती ॥६४॥

तों मूळ न पाठवितां रावण ॥ प्रधानासहित आला धांवोन ॥ सभा गजबजली संपूर्ण ॥ म्हणती विघ्न आलें हें ॥६५॥

आतां गति येथें नव्हे बरी ॥ बळेंचि उचलोन नेईल नोवरी ॥ कोणी म्हणती क्षणाभीतरीं ॥ चंडीशचाप चढवील हा ॥६६॥

जनकासी म्हणे रावण ॥ तुवां धनुष्याचा केला पण ॥ तरी क्षणमात्रें तें मोडून ॥ कुटके करीन येथेंचि ॥६७॥

म्यां हालविला कैलास ॥ बंदीं घातले त्रिदश ॥ ऐरावतासमवेत देवेश ॥ समरभूमीस उलथिला ॥६८॥

तो मी रावण प्रतापशूर ॥ चाप लावाया काय उशीर ॥ उपटोनियां मेरुमांदार ॥ कंदुका ऐसे उडवीन ॥६९॥

पृथ्वी उचलोनि अकस्मात ॥ घालूं शकें मी समुद्रांत ॥ कीं घटोद्भवासारिखा सरितानाथ ॥ क्षणमात्रें शोषीन मी ॥७०॥

तरी आतां हेंचि प्रतिज्ञा पाहीं । हें चाप मोडूनि लवलाहीं ॥ होईन जनकाचा जावई ॥ सकळ रायां देखतां ॥७१॥

बसनें भूषणें सांवरून । चापाकडे चालिला रावण । गजगजिले जानकीचें मन अति उदिग्न जाहली ॥७२॥

म्हणे आपर्णापति त्रिनयना ॥ त्रिपुरांतका मदन दहना ॥ तुझें चाप नुचले रावणा ॥ गजास्थ जनका ऐसें करी ॥७३॥

या दुर्जनाचे तोंड काळें ॥ सदाशिवा करी शीघ्र वहिलें ॥ महा दैवतें प्रचंड सबळें ॥ या धनुष्यावरी बैसवी ॥७४॥

अहो अंबे मूळपीठ निवासिनी ॥ मंगळ कारके आदि जननी । या रावणाच्या शक्ती हिरुनी ॥ नेई मृडानी सत्वर ॥७५॥

ऐसें जानकीनें प्राथिलें । तो दैवतें धांविन्नलीं सकळे । गुप्तरूपें शीघ्र काळैं ॥ येऊन बैसली चापावरी ॥७६॥

नवकोटी कात्यायनी ॥ चौसष्ट कोटी योगिनी ॥ यां सहित कालिका येउनी ॥ धनुष्यावरी बैसत ॥७७॥

धनुष्य उचलूं गेला दशवक्त्र । तंव ते न ढळेचि अणुमात्र । बळें लाविले वीसही कर । जाहलें शरीर निस्तेज पै ॥७८॥

द्विपपंक्तीनें अधर प्रांत । शक्रारि जनक बळेंरगडित । चा उभें करितां त्वरित । जाहलें विपरीत तेधवां ॥७९॥

जैसा महाद्रुय उन्मळे । तैसें शिवचाप कलथलें । रावण उताणा पडे ते वेळे । हलकल्लोळ मांडला ॥८०॥

जैसा पूर्वीं गयासुर दैत्य । त्यावरी ठेविला पर्वत । तैसाचि पडला लंकानाथ । धनुष्य अद्भुत उरावरी ॥८१॥

रावण पडतां भूतळीं । सभेवरी उसळली धुळी । दाही मुरवीं मृत्तिका पडली । आनंदली जानकी ॥८२॥

दाही मुखीं रुधिर वाहत । कासावीस जाहला बहुत । म्हणे धांवा धांवा समस्त । धनुष्य त्वरित काढा हें ॥८३॥

रावण म्हणे जनकाप्रती । माझे प्राण चालिले निश्र्चितीं । परी इंद्रजित कुंभकर्ण असती । तुज निर्दाळिती सहमुळीं ॥८४॥

गजबजली सभा समस्त । म्हणती कोण बळिवंत । हें चाप उचलील उद्भुत । महा अनर्थ ओढवला ॥८५॥

घाबरा झाला मिथुळेश्र्वर । म्हणे पृथ्वी झाली निर्वीर । क्षेत्री भार्गवें आटिले समग्र । त्रिसप्त वेळां हिंडोनि ॥८६॥

या सभेमाजीं बळिवंत । कोणी क्षेत्री नाहीं रणपंडित । कौशिकें ऐसी ऐकतां माता खुणावित श्रीरामचंद्रा ॥८७॥

जैसा निद्रिस्त सिंह जागा केला । कीं याज्ञिकें जात वेद फुंकिला । तैसा विश्र्वामित्रें ते वेळां । खुणाविला रघुवीर ॥८८॥

म्हणे नरवीर पंचानना । त्रिभुवन वंद्या राजवनयना । पुराण पुरुषा रघुनंदना । अरि मर्दना ऊठ वेगीं ॥८९॥

कमलोद्भव जनका उदारा । ताटिकांतका अहल्योध्दारा । मख पाळका समर धीरा । असुर संहारका ऊठ वेगी ॥९०॥

जैशी निशा संपतां तत्काळ । उदयाद्रिवरी ये रविमंडळ । तैसा राम तमालनीळ । उठून उभा ठाकला ॥९१॥

कीं महायाग होतां पूर्णाहुती । तत्काळे प्रकटे आराध्य मूर्ती । तैसा उभा ठाकला रघुपती । राजे पाहती टकमकां ॥९२॥

कीं प्रल्हादा कारणें झडकरी । स्तंभांतूनि प्रकटे नरहरी । कीं वेदांत ज्ञान होतां अंतरीं । निजबोध जेवीं प्रकटे ॥९३॥

वंदोनियां गुरुचरणां सवेंचि नमिलें सकळ ब्राह्मणां । पूर्ण ब्रह्मानंद रामराणा । वेद पुराणां वंद्य जो ॥९४॥

श्रीराम विरक्त ब्रह्मचारी । हे रमा आपणाविण कोण नवरी । या लागीं शरशुवीर विहारी । उठता जाहला तेधवां ॥९५॥

सभेस बैसले नृपवर । केले नानापरींचें शृंगार । परी सर्वांत श्रेष्ठ श्रीरामचंद्र । रोहिणीवर भगणांत जैसा ॥९६॥

कीं शास्त्रांमाजी वेदांत । कीं निर्जरांमाजी शचीनाथ । तैसा श्रीराम समर्थ । सभेत मुख्य विराजे ॥९७॥

उठिला देखोनि श्रीरामचंद्र । उचंबळला सीचे चा सुख समुद्र । नव मेघ रंग रघुवीर । रंग मंडपा प्रति आला ॥९८॥

कोटि अनंग ओवाळून । टाकावे ज्याच्या नखावरून ॥ जो अरिचक्रवारण पंचानन ॥ जात लक्षून धनुष्यातें ॥९९॥

देखतां राम सुकुमार ॥ घाबरलें सीतेचें अंतर ॥ म्हणे कोमळगात्र रघुवीर ॥ प्रचंड थोर धनुष्य हें ॥१००

कूर्मपृष्ठी जैसा कठोर ॥ तैसें हें कोदंड प्रचंड थोर ॥ दशरथकुमार सुकुमार ॥ कैसें उचलेल तयातें ॥१॥

मदनदहनाचें धनुष्य थोर ॥ रघुनाथमूर्ति मदनमनोहर ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥२॥

घनश्यामकोमळगात्र ॥ राजकुमार राजीवनेत्र ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥३॥

बळहत केला दशकंधर ॥ परम कोमल रघुपतीचे कर ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥४॥

वाटे खुपती कोमळ कर ॥ ऐसी रामतनु सुकुमार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥५॥

मज न गमेचि दुसरा वर ॥ तुज सत्य करणें पण साचार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुजा ॥६॥

चंडीशकोदंड प्रचंड थोर ॥ लघुआकृति राम निर्विकार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुजा ॥७॥

श्रीरामावांचून इतर ॥ पुरुष तुजसमान साचार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥८॥

दुजा वरावया येतां वर ॥ देह त्यागीन हा निर्धार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥९॥

सीता विजयेसी म्हणे अवधारीं ॥ बाप नव्हे हा वाटतो वैरी ॥ हा पण त्यजोनि निर्धारीं ॥ रामासी मज अर्पीना ॥११०॥

ऐसें सीतेचें अंतर ॥ जाणोनियां जगदोद्धार ॥ दंड पिटोनि प्रचंड थोर ॥ कोदंडासमीप पातला ॥११॥

दशरथ महाराज दिग्गज ॥ त्याचा छावा रघुराज ॥ धनुष्यइक्षु देखोनि सहज ॥ परम चपळ धांविन्नला ॥१२॥

श्रीरामसव्यबाहु प्रचंड ॥ हाचि वरी केला शुंडादंड ॥ भवधनुष्यइक्षु द्विखंड ॥ करील आतां निर्धारें ॥१३॥

दशकंधर हें पद्मकानन ॥ वीस हस्त द्विपंचवदन ॥ तीस कमळें हीच पूर्ण ॥ कोदंड जाण इक्षु तेथें ॥१४॥

पद्मवनीं गज निघे लवलाहीं ॥ मग त्यासी कमळांची गणना काई ॥ तैशीं दशमुखाचीं हस्तकमळें पाहीं ॥ तुडवीत आला रघुवीर ॥१५॥

तटस्थ पाहती सकळ जन ॥ म्हणती विजयी हो कां रघुनंदन ॥ सीतानवरी हे सगुण ॥ यासीच घालो निजमाळा ॥१६॥

आनंदमय सकळ ब्राह्मण ॥ चिंतिती रामासी जयकल्याण ॥ म्हणती हें भवचाप मोडून ॥ टाको रघुवीर सत्वर ॥१७॥

एक म्हणती राम सुकुमार ॥ नीलपंकजतनु वय किशोर ॥ भवकोदंड प्रचंड थोर ॥ उचलेल कैसें रामातें ॥१८॥

एक म्हणती चिमणें रामाचें ठाण ॥ एक म्हणती सिंह दिसतो लहान ॥ परी पर्वताकार गज विदारून ॥ न लागतां क्षण टाकितो ॥१९॥

घटोद्भव लहान दिसत परी क्षणें प्राशिला सरितानाथ ॥ गगनीं सविता लघु भासत ॥ परी प्रभा अद्भुत न वर्णवे ॥१२०॥

असो ते वेळे रघुवीर ॥ विद्युत्प्राय उत्तरीय चीर ॥ तें सरसावोनि सत्वर ॥ कटिकप्रदेशीं वेष्टिलें ॥२१॥

माथां जडित मुकुट झळकत ॥ आकर्णनेत्र आरक्त रेखांकित ॥ मस्तकीचें केश नाभीपर्यंत ॥ दोहोकडोनि उतरले ॥२२॥

किशोर सुकुमार भूषण ॥ अलकसुवासें भरलें गगन ॥ त्या सुवासासी वेधून ॥ मिलिंदचक्र भ्रमतसे ॥२३॥

श्रीरामतनूचा सुवास पूर्ण ॥ जात सप्तावरण भेदून ॥ असों तें शिवधनुष्य रघुनंदन ॥ करें करोनियां स्पर्शीत ॥२४॥

नीलवर्ण कुंतल ते अवसरीं ॥ पडले दशकंठाचे हृदयावरी ॥ विषयकंठवंद्य ते अवसरीं ॥ सांवरोनि मागें टाकित ॥२५॥

शिवधनुष्यासीं घंटा सतेज ॥ वरी विद्युत्प्राय झळके ध्वज ॥ त्सासमवेत रघुराज ॥ उचलिता जाहला ते काळीं ॥२६॥

गज शुंडेनें आक्रमी इक्षुदंड ॥ तैसें रामें आकर्षिलें कोदंड ॥ पराक्रम परम प्रचंड ॥ दशमुंड विलोकीतसे ॥२७॥

परम म्लान द्विपंचवदन ॥ दृष्टीं देखोनि गाधिनंदन ॥ म्हणे नरवीरश्रेष्ठा वेगेंकरून ॥ संशय हरणे सर्वांचा ॥२८॥

जनक म्हणे कौशिक मुनी ॥ ज्या चापें दशकंठ धोळिला धरणींते धनुष्य रामाचेनी ॥ कैसें उचलेल नेणवे ॥२९॥

जनकासी म्हणे ऋषि कौशिक श्रीराम हा वैकुंठ नायक । अद्भुत करील कौतुका पाहें नावेक उगाचि ॥१३०॥

इकडे रामें धनुष्य उचलून । क्षण न लागता वाहिला गुण । ओढी ओढिली आकर्ण सुहास्य वदनें तेधवां ॥३१॥

श्रीरामाचें बळ प्रचंड । ओढीस न पुरेचि भव कोदंड । तडाडिलें तेणें ब्रह्मांड । चाप कर करिलें तेधवां ॥३२॥

मुष्टीमाजीं तडाडित । जैशा सहस्र चपळा कडकडित । विधि आणि वृत्रारि हडबडित । वाटे कल्पांत जाहला ॥३३॥

उर्वी मंडळ डळमळित । भोगींद्र मान सरसावित । दंतबळें उचलोनि देत । आदिवराह पाताळीं ॥३४॥

सभा सकळ मुर्च्छित जाहली । महावीरांची शस्त्रें गळालीं । राजे भाविती उर्वी चालिली । रसातळा आजीच ॥३५॥

रामें चाप केलें द्विखंड । प्रतापें भरलें ब्रह्मांड । पुष्प संभार उदंड । वृंदारक वर्षती ॥३६॥

सभा सकळ मुर्च्छित जाहली । परी एक चौघे सावध पाहत । जनक आणि गाधिसुत । सीता सौमित्र चौघेंही ॥३७॥

असो भवकोदंड मोडोनी । द्विखंड रामें टाकिली धरणीं । रावण उठोन ते क्षणीं । अधोवदनें चालिला ॥३८॥

सभेस मारावया आणिती तस्कर । तैसा म्लान दिसे दशवक्त्र । कीं रणीं अवेश आलिया महावीर । त्याचा मुखचंद्र उतरे जेवीं ॥३९॥

कीं दिव्य देतां खोटा होत । मग तो मुख नदाखवती लोकांत । तैसा प्रधानेंसी लंकानाथ । गेला त्वरित स्वस्थाना ॥१४०॥

पुण्य सरतां स्वर्गींहूनि खचला । कीं याज्ञिकें अंत्यज बाहेर घातला । कीं द्विज याती भ्रष्ट जाहला । तो जेवीं दवडिला पंडितीं ॥४१॥

याची प्रकारें सभेंतूनी । रावण गेला उठोनी । जैसा केसरीच्या कवेंतूनी । जंबूक सुटला पूर्व भाग्यें ॥४२॥

असो इकडे विजयी रघुनंदन । जैसा निरभ्र नभीं चंड किरण । सुकुमार नव घन तनु सगुण । भक्तजन पाहती ॥४३॥

सर्वांचे नयनीं अश्रुपात । ऋषि चक्र सद्रदित । हा कोमल गात्र रघुनाथ । कठीण चाप केवी भंगिलें ॥४४॥

श्रीराम सौकुमार्याची राशी । विश्र्वामित्रें धांवोनि वेगेंसी । रघुवीर आलिंगला मानसीं । प्रेमपूर न आवरे ॥४५॥

म्हणे आदिपुरुषा पूर्णब्रह्मा । स्मरारि मित्रा आत्मयारामा । भक्तकाम कल्पद्रुमा । अद्भुत लीला दाविली ॥४६॥

तुझ्या करणी वरूनि लावण्य खाणी । ओंवाळावी वाटे समग्र धरणी । आणि या जीवाची कुरवंडी करोनी । तुज वरोनि सांडावी ॥४७॥

इतुक्यांत करिणी वरोन लावण्य खाणी । खालीं उतरोनि तेच क्षणीं । माळ घेऊन नंदिनी । हंस गमनी चमकत ॥४८॥

मेदिनी म्हणे मी धन्य । माझी कन्या वरील रघुनंदन । श्रीराम जामात सगुण । मन मोहन जगद्वंद्य ॥४९॥

श्रीराम जगाचा जनिता । जानकी सहजचि जगन्माता । तारावयासी निज भक्तां । आली उभयतां रूपासी ॥१५०॥

श्रीराम सच्चिदानंद घन तनु । जो पुराण पुरुष पुरातनु । जो पूर्णावतारी पूर्णब्रह्म धनु । सकळ तनूंचा साक्षी पैं ॥५१॥

आदि मध्य जो अंती । परी हाचि एक सीतेचा पती । तुच्छ करून सकळ नृपती । वरी रघुपती प्रियकर ॥५२॥

हंस गती जानकी चालत । पद भूषणें मधुर गर्जत । गळां माळ घालूनि त्वरित । मस्तक चरणीं ठेविला ॥५३॥

गळां घालतांचि माळ । जाहला स्वानंदाचा सुकाळ । वाद्यें वाजों लागलीं तुंबळ । नांदें निराळ दुमदुमिलें ॥५४॥

संतोषला मिथुळेश्र्वर । म्हणे माझे भाग्यास नाहीं पार । जांवई जाहला रघुवीर । भुवन सुंदर मेघश्याम ॥५५॥

जनकें आणि विश्र्वामित्रें । लिहीलीं अयोध्येसी दिव्य पत्रें । घेऊनियां दूत त्वरें ॥ अयोध्येसी पातले ॥५६॥

कुंकुममंडित पत्रें ॥ लिहिलीं होती विश्र्वामित्रें ॥ ती उचलोनी अजराजपुत्रें ॥ वसिष्ठाकरीं दीधलीं ॥५७॥

दोहींतील एकचि अभिप्राय ॥ गूढ परम लिहिलें चातुर्य ॥ त्याचा अर्थ करोनि ऋषिवर्य ॥ ब्रह्मकुमर सांगतसे ॥५८॥

हिमनगजामातसायकासन ॥ भंगूनि विजयी झाला बाण ॥ तेव्हां थरथरिला पूर्ण ॥ आनंदघन रथस्वामी ॥५९॥

गुणें केली बहुत स्तुति ॥ आनंदें यश वर्णी सारथी ॥ जोंवरी रथचक्रे असती ॥ वोहोरें नांदोत तोंवरी ॥१६०॥

रथगर्भीं होतें जें निधान ॥ तेणें बाणप्रताप देखोन ॥ ऐक्य झालें चरणीं येऊन ॥ तुम्हीं त्वरेंकरून येईंजे ॥६१॥

अर्थ सांगे वसिष्ठमुनि ॥ साक्ष श्र्लोक असे महिम्नीं ॥ त्रिपुरवधीं जेव्हां शूलपाणि ॥ बाण चक्रपाणि जाहला ॥६२॥

पृथ्वीचा केला तेव्हां रथ ॥ चंद्रमित्र चाकें अद्भुत ॥ कनकाद्रि धनुष्य होत ॥ गुण तेथें फणींद्र पैं ॥६३॥

सारथि झाला कमलासन ॥ जानकी रथगर्भींचें रत्न ॥ बाण तोचि हा रघुनंदन ॥ शिव धनुष्य जेणें भंगिलें ॥६४॥

ऐसा अर्थ सांगे ब्रह्मसुत ॥ आनंदला राजा दशरथ ॥ दळभारें सिद्ध होत ॥ धाव देत निशाणीं ॥६५॥

सोळा पद्में दळभार ॥ चतुरंग दळ निघे निघे सत्वर ॥ सुमंतादि प्रधान राजकुमार ॥ भरतशत्रुघ्न निघाले ॥६६॥

कौसल्या सुमित्रा कैकयी राणी ॥ निघाल्या आरूढोनि सुखासनीं ॥ दूत वेत्रकनकपाणीं ॥ सहस्रावधि धांवती पुढें ॥६७॥

सप्तशतें दशरथाच्या युवती ॥ त्याही रामलग्ना पाहों येती ॥ सुखासनीं बैसोनि जाती ॥ अनुक्रमें करूनियां ॥६८॥

प्रजालोक निघाले समस्त ॥ निजरथीं बैसे दशरथ ॥ लक्षोनियां मिथिलापंथ ॥ परम वेगें चालिले ॥६९॥

पृथ्वीपति राजा दशरथ ॥ मस्तकीं आतपत्रें विराजित ॥ मित्रपत्रें परत शोभत ॥ दोहीं भागीं समसमान ॥१७०॥

मृगांकवर्ण चामरें ॥ एकावरी विराजती तुंगारपत्रें ॥ एक उडविती लघु चिरें ॥ दोहींकडे श्र्वेतवर्ण ॥७१॥

मकरबिरुदें पुढें चालती ॥ नभचुंबित ध्वज विराजती ॥ वाद्यगजरें करून क्षिती ॥ दुमदुमिली तेधवां ॥७२॥

पुढें शमदमांचे पायभार ॥ मागें सद्विवेकाचे तुरंग अपार ॥ त्यापाठीं निजबोधाचे कुंजर ॥ किंकाटती रामनामें ॥७३॥

निजानुभवाचे दिव्य रथ ॥ त्यावरी आरूढले वऱ्हाडी समस्त ॥ वारू तेचि चारी पुरुषार्थ ॥ समानगती धांवती ॥७४॥

जागृती प्रथम पेणें सत्य ॥ स्थूळ परग्राम अद्भुत ॥ तेथें न राहे दशरथ ॥ चित्तीं रघुनाथ भरला असे ॥७५॥

पुढें स्वप्नावस्था सूक्ष्मनगर ॥ तेथें न राहे अजराजकुमर ॥ म्हणे जवळी करावा रघुवीर ॥ आडवस्ति करूं नका ॥७६॥

पुढें सुषुप्ति अवस्था कारणपूर ॥ सदा ओस आणि अंधकार ॥ रामउपासक वऱ्हाडी थोर ॥ जाती सत्वर पुढेंचि ॥७७॥

मिथिलेबाहेर उपवन ॥ तुर्या अवस्था दिव्यज्ञान ॥ पुढें रघुनाथप्राप्तीचें चिन्ह ॥ राहिले लक्षोन तेथेंचि ॥७८॥

पुढें विराजे विदेहनगर ॥ ऐकों येत अनुहत वाद्यगजर ॥ निजभारेंसी विदेहनृपवर ॥ आला सामोरा दशरथा ॥७९॥

असो दृष्टी देखतां विदेहनृप ॥ आनंदें उठिला अयोध्याधिप ॥ क्षेम दीधलें सुखरूप ॥ अनुक्रमें सकळिकांसी ॥१८०॥

भरत शत्रुघ्न देखोन ॥ म्हणे आमचे सदनींहून ॥ राम सौमित्र आले रुसोन ॥ जनक संदेहीं पडिलासे ॥८१॥

दशरथ म्हणे हे शत्रुघ्न भरत ॥ आश्र्चर्य करी मिथिलानाथ ॥ असो समस्त गजरेंसी मिरवत ॥ निजमंडपांत आणिले ॥८२॥

चापखंडें देखतां ते वेळे ॥ वीरांसी रोमांच उभे ठाकले ॥ एकांचे नेत्रीं अश्रु आले ॥ कोदंडखंडें देखतां ॥८३॥

तंव तो भक्तकामकल्पद्रुम ॥ कौसल्येनें जवळी देखिला राम ॥ धांवोनि आलिंगिला परम ॥ हृदयीं प्रेम न समाये ॥८४॥

मांडीवरी घेऊनि रघुवीर ॥ म्हणे रामा तूं कोमलांग सुकुमार ॥ चंडीशकोदंड परम कठोर ॥ कैसें चढवोनि मोडिलें ॥८५॥

दशरथें आलिंगिला राम ॥ जो सच्चिदानंद मेघश्याम ॥ भरत शत्रुघ्न परम सप्रेम ॥ श्रीरामचरण वंदिती ॥८६॥

असो जनकें दिव्य मंदिरें ॥ जानवशासी दीधलीं अपारें ॥ दोहींकडे मंडप उभविले त्वरें ॥ मंगलतूर्यें वाजती ॥८७॥

लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ परम प्रतापी राजनंदन ॥ जनकरायें देखोन ॥ दशरथासी विनविलें ॥८८॥

म्हणे जानकी दिधली रघुनंदना ॥ ऊर्मिला देईन लक्ष्मणा ॥ मांडवी श्रुतकीर्ति बंधुकन्या ॥ भरतशत्रुघ्नां देईन मी ॥८९॥

दशरथासी मानला विचार ॥ देवकप्रतिष्ठा केली सत्वर ॥ चौघी कन्यांसी परिकर ॥ हरिद्रा लाविली तेधवां ॥१९०॥

सीतेची शेष हरिद्रा ॥ ते पाठविली रामचंद्रा ॥ भरत शत्रुघ्न सौमित्रा ॥ शेष आलें तैसेंचि ॥९१॥

असो यथाविधि जाहलें नाहाण ॥ नोवरे बैसले चौघेजण ॥ तों जनक वऱ्हाडी वऱ्हाडिणी घेऊन ॥ मुळ आला वरांसी ॥९२॥

शांति क्षमा दया उन्मनी ॥ सद्बुद्धि सद्विद्या कामिनी ॥ तितिक्षा मुमुक्षा विलासिनी ॥ तुर्या आणि उपरति ॥९३॥

सुलीनता समाधि सद्रति ॥ परमसदनीं ह्या मिरविती ॥ तों वऱ्हाडी पातले निश्र्चिती ॥ श्रीरामासी न्यावया आले ते ॥९४॥

बोध आनंद सद्विवेक ॥ ज्ञान वैराग्य परमार्थ देख ॥ निष्काम अक्रोध अनुताप चोख ॥ रघुनायक विलोकिती ॥९५॥

जनकें पूजोनि चौघे वर ॥ तुरंगीं बैसविले सत्वर ॥ पुढें होत वाद्यांचा गजर ॥ गगनीं सुरवर पाहती ॥९६॥

मिरवत आणिले चौघेजण ॥ मणिमय चौरंग समसमान ॥ मधुपर्कविधि वरपूजन ॥ यथासांग करी नृपनाथ ॥९७॥

रघुपतीचें पद सुंदर ॥ स्वयें प्रक्षाळी मिथिलेश्र्वर ॥ सुमेधा घाली वरी नीर ॥ कनकझारीं घेऊनियां ॥९८॥

वेदांचा निर्मिता रघुनाथ्ज्ञ ॥ त्यासी घालिती यज्ञोपवीत ॥ रायें षोडशोपचारयुक्त ॥ पूजा केली तेधवां ॥९९॥

घटिका प्रतिष्ठिली अंतरीं ॥ कौशिक सर्वांसी सावध करी ॥ म्हणे वादविवादशद्बकुसरी ॥ टाकोन झडकरीं सावध व्हावें ॥२००

चौघी कन्या आणिल्या बाहेरी ॥ डौरिल्या दिव्यवस्त्रालंकारीं ॥ स्नुषा देखोनि ते अवसरीं ॥ आश्र्चर्य करी दशरथ ॥१॥

अंतरपट मध्यें धरून ॥ तो फेडावयासी विद्वज्जन ॥ सुरस मंगळाष्टकें म्हणोन ॥ सावधान म्हणताती ॥२॥

जनकाची जी पट्टराणी ॥ सुमेधा नामें पुण्यखाणी ॥ चौघे जामात देखोनी ॥ आनंद मनीं समाये ॥३॥

म्हणे श्रीरामाच्या मुखावरून ॥ कोटी काम सांडावे ओंवाळून ॥ जानकीचें भाग्य धन्य ॥ ऐसें निधान जोडलें ॥४॥

असो मंगळाष्टकें म्हणती पंडित ॥ लग्नघटिका संपूर्ण भरत ॥ ॐपुण्या आचार्य म्हणत ॥ तों अंतरपट फिटलासे ॥५॥

मंगलाकार चापपाणी ॥ त्याचे मस्तकीं मंगलभगिनी ॥ मंगलाक्षता घालोनी ॥ मस्तक चरणीं ठेविला ॥६॥

सीतेचे मस्तकीं रघुनाथ ॥ लग्नाक्षता घाली त्वरित ॥ तोचि मस्तकीं ठेविला हस्त ॥ अक्षय कल्याणदायक जो ॥७॥

सीतेनें वरितां रघुनंदन ॥ ऊर्मिळेने परिणिला लक्ष्मण ॥ मांडवीनें भरत सगुण ॥ श्रुतकीर्ति शत्रुघ्न वरीतसे ॥८॥

तो मंगलतूर्यांचा घोष आगळा ॥ परम जाहला ते वेळां ॥ तेथींचा वर्णावया सोहळा ॥ सहस्रवदना अशक्य ॥९॥

अक्षय भांडारें बहुत ॥ जनक वरदक्षिणा देत ॥ याचकजन समस्त ॥ तृप्त केले निजधनें ॥२१०॥

विवाहहोमालागीं निर्धारीं ॥ वेगीं चला बहुल्यावरी ॥ नोवऱ्या कडिये झडकरी ॥ घेवोनियां चलावें ॥११॥

ऐकोनि हांसे रघुपती ॥ म्हणे प्रपंचाची विपरीत गति ॥ तों वसिष्ठ म्हणे रघुपति ॥ कडिये घेईं सीतेतें ॥१२॥

सीता उचलितां श्रीरामें ॥ तैसेंच तिघे करिती अनुक्रमें ॥ बहुल्यावरी आनंदप्रेमें ॥ चौघेजण बैसले ॥१३॥

लज्जाहोमादि सर्व विधि सिद्ध ॥ करी अहल्यासुत शतानंद ॥ जनकासी जाहला परम आनंद ॥ तो आल्हाद न वर्णवे ॥१४॥

तों अंतर्गृहीं रघुवीर ॥ पूजावया चालिला गौरीहर ॥ सीतेसी कडिये घेऊनि सत्वर ॥ श्रीरामचंद्र चालिला ॥१५॥

गौरीहर पूजोनि त्वरें आंबा शिंपिती चौघें वोहरें ॥ निंबलोण निजकरें ॥ सुमेधा उतरी तेधवां ॥१६॥

सुमेधेनें जाऊनि ते क्षणीं ॥ प्रार्थोनि आणिल्या तिघी विहिणी ॥ दिव्य वस्त्रालंकारें गौरवूनि ॥ मंडपात बैसविल्या ॥१७॥

देखोनिया चौघी सुना ॥ आनंद जाहला तिघींचिया मना ॥ इकडे जनक विनवी रघुनंदना ॥ विज्ञापना परिसावी ॥१८॥

चार दिवसपर्यंत ॥ येथेंच क्रमावे माझा हेत ॥ साडे जाहलिया त्वरित ॥ मग अयोध्येसी जाइंजे ॥१९॥

पुढील जाणोनि वर्तमान ॥ तें न मानीच रघुनंदन ॥ म्हणे आम्ही आतां येथून ॥ करूं गमन अयोध्येसी ॥२२०॥

कां त्वरा करितो रघुवीर ॥ आतां युध्दासी येईल फरशधर ॥ तरी तो प्रचंड वीर अनिवार ॥ मिथिलानगर जाळील पैं ॥२१॥

यालागीं संहारावया दशकंधर ॥ जाणें सत्वर लंकेसी ॥२२॥

झेंडा नाचवूं लंकेपुढें ॥ राक्षसांची अपार मुंडें ॥ ओंवाळणी पडतील कोंडें ॥ करील साडे बिभीषण ॥२३॥

ऐसें श्रीरामाचें मनोगत ॥ वसिष्ठ जाणोनि त्वरित ॥ जनकासी सांगे गुह्यार्थ ॥ वोहरें आतांचि बोळवीं ॥२४॥

मग जे अयोध्यावासी जन ॥ समस्तांसी दीधलें भोजन ॥ चौघें वोहरें आणि अजनंदन ॥ राण्या समस्त जेविल्या ॥२५॥

तात्काळ साडे करून ॥ वस्त्रालंकार सर्वांस अर्पून ॥ चौघांजणांसी आंदण ॥ अपार दीधलें तेधवां ॥२६॥

अश्र्व गज दास दासी ॥ तन मन धन अर्पिलें श्रीरामासी ॥ जनक निघाला स्वभारेंसी ॥ दशरथासी बोळवित ॥२७॥

ऐसें देखोनि नारद ऋृषि ॥ वेगें धांविन्नला बद्रिकाश्रमासी ॥ देखोनियां भृगुकुळटिळकासी ॥ म्हणे बैसलासी काय आतां ॥२८॥

तूं द्विजकुळीं महाराज वीरेश ॥ आणि त्या रामें तुझें भंगिलें धनुष्य ॥ तुज थोर आलें अपयश ॥ रामें यश वाढविलें ॥२९॥

मग बोले भृगुकुळदिवाकर ॥ आमचें अवतारकृत्य जाहलें समग्र ॥ मग म्हणे कमलोद्भवपुत्र ॥ तुज अणुमात्र क्रोध नये ॥२३०॥

जमदग्नीनें क्रोध टाकिला ॥ तो तात्काळचि मृत्यु पावला ॥ तुजही तैशीच आली वेळा ॥ दशरथी तुजला न सोडी ॥३१॥

शिवें तुज दीधलें पिनाक जाण ॥ तेणें घेतलें क्षत्रियांचे प्राण ॥ ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ जमदग्निसुत क्षोभला ॥३२॥

किंवा मृगेंद्र निजेला ॥ तो पदघातें हाणोन जागा केला ॥ कीं नरसिंहचि प्रकटला ॥ स्तंभाबाहेर दुसऱ्यानें ॥३३॥

घृतें शिंपिला वैश्र्वानर ॥ कीं नासिकेवरी ताडिला व्याघ्र ॥ कीं बळेंचि खवळिला फणिवर ॥ कीं महारुद्र कोपविला ॥३४॥

मग विष्णुचाप चढविलें ॥ नारद भार्गव दोघे निघाले ॥ श्रीरामासी आडवे आले ॥ मनोवेगेंकरूनियां ॥३५॥

सांवळा पुरुष दैदीप्यमान ॥ विशाळनेत्र सुहास्यवदन ॥ जटामुकुट मस्तकीं पूर्ण ॥ यज्ञोपवीत झळकतसे ॥३६॥

कांसेसी विराजे पीतांबर ॥ तडित्प्राय उत्तरीयवस्त्र ॥ परम आरक्त दिसती नेत्र ॥ कीं सहस्रकर उतरला ॥३७॥

धनुष्यास बाण लावून ॥ मार्गीं उभा ठाकला येऊन ॥ सोळा पद्में दळ संपूर्ण ॥ कंपायमान जाहलें ॥३८॥

ती सप्तकें जेणें फिरोनि ॥ निर्वीर केली अवनि ॥ अवघे राजे टाकिले आटोनि ॥ कीं प्रळयाग्नि दुसरा ॥३९॥

ऐसा तो महाराज जामदग्न्य ॥ क्षत्रियजलदजालप्रभंजन ॥ कीं हा कुठारपाणि भृगुनंदन ॥ वीरकानन निर्मुळ केलें ॥२४०॥

मार्गीं देखतां महाव्याघ्र ॥ भयाभीत होती अजांचे भार ॥ तैसा देखतां रेणुकापुत्र ॥ शस्त्रें गळालीं बहुतांचीं ॥४१॥

गजबजिला दळभार समस्त ॥ मिथिलेश्र्वर होय भयभीत ॥ स्त्रियांमाजी दडला दशरथ ॥ म्हणे अनर्थ थोर मांडिला ॥४२॥

तो वैराग्यगजारूढ रघुनाथ ॥ वरी निर्धार चवरडोल शोभत ॥ पुढें अनुभव बैसला महावत ॥ विवेकांकुश घेऊनियां ॥४३॥

ज्ञानाचे ध्वज फडकती ॥ चपळेऐसे सतेज तळपती ॥ विज्ञानमकरबिरुदें निश्र्चिती ॥ पुढें चालती स्वानंदें ॥४४॥

निवृत्तीच्या पताका पालविती मुमुक्षुसाधका ॥ रामनामचिन्हांकित देखा ॥ दयावातें फडकती ॥४५॥

मनपवनाचे अश्र्वभार चालिले ॥ अनुसंधानवाद्रोरे लाविले ॥ विरक्तिपाखरेनें झांकिले ॥ अनुभवाचे सोडलिे मुक्तघोस ॥४६॥

चिद्ररत्नजडित दिव्य रथ ॥ चारी वाचा चक्रें घडघडित ॥ घोडे जुंपिले चारी पुरुषार्थ ॥ सारथि तेथें आनंद पैं ॥४७॥

नामशस्त्रें घेऊनि हातीं ॥ सोहंशब्दें वीर गर्जती ॥ क्षणें प्रपंचदळ विध्वंसिती ॥ नाटोपती कळिकाळा ॥४८॥

रामावरी अद्वयछत्र ॥ स्वानंदाचें मित्रपत्र ॥ तन्मय चामरें परिकर ॥ प्रेमकुंचे वरी ढाळिती ॥४९॥

हडपेकरी शुद्धसत्व ॥ निजभक्तीचे विडे देत ॥ अष्टभाव सेवक तेथ ॥ राघवा पुढें धांवती ॥२५०

अनुतापलघुचीर घेऊनी ॥ मायिक धुरोळा वारी ते क्षणीं ॥ तर्क पिकपात्र धरूनी ॥ मुख विलोकिती रामाचें ॥५१॥

सौमित्र भरत शत्रुघ्न बंधू ॥ हेचि सच्चिदानंद आनंदू ॥ स्वरूपप्राप्तीचे कुंजर अभेदू ॥ तयांवरी आरूढले ॥५२॥

हिरे जडले दांतोदांती ॥ वरी मुक्तजाळिया मिरवती ॥ कामक्रोधांचे तरु मोडिती ॥ सहज जातां निजपंथें ॥५३॥

आशा तृष्णा कल्पना भ्रांति ॥ वाटे जातां गुल्में छेदिती ॥ शुंडा होणोनियां दांतीं ॥ कडे फोडिती विषयांचे ॥५४॥

मदमत्सरदंभपर्वत ॥ रथचक्रातळीं पिष्ट होत ॥ कुमतें पाषाण पिष्ट करित ॥ रगडोन जाती घडघडां ॥५५॥

धैर्यतुरंग अलोट चपळ ॥ मायारणांगणीं तळपती सबळ ॥ वरी रामउपासक निर्मळ ॥ कळिकाळासी न गणती ॥५६॥

शमदमांचे पायभार ॥ निष्कामखंडें झेलिती समग्र ॥ भवदळभंजन प्रतापशूर ॥ आत्मस्थितीं चालती ॥५७॥

अनुहत वाद्यें वाजती ॥ ऐकतां कुतर्क पक्षी पळती ॥ कर्मजाळ वनचरें निश्र्चितीं ॥ टाकोनि जाती स्वस्थाना ॥५८॥

चारी साही अठराजण ॥ रामासी वानिती बंदिजन ॥ चारी मुक्ति आनंदेकरून ॥ नृत्य करिती राघवापुढें ॥५९॥

वाटेसी अविद्या वहाती सरिता ॥ ते कोरडी जाहली दळ चालतां ॥ भाव निश्र्चय तत्वतां ॥ वेत्रधारी पुढें धांवती ॥२६०॥

सोहंभाव गर्जत ॥ वाटेसी द्वैतजनांतें निवारित ॥ पुढें भक्त स्वानंदें नाचत ॥ गुण वर्णित राघवाचे ॥६१॥

एक जाहले निःशब्द मुके ॥ ऐकती रामचरित्र कौतुकें ॥ एक अत्यंत बोलके ॥ एक समाधिसुखें डोलती ॥६२॥

ऐसा निजभारेंसी रघुनंदन ॥ जो कौसल्याहृदयमांदुसरत्न ॥ निजभार थोकला देखोन ॥ गजारूढ पुढें झाला ॥६३॥

तंव तो क्षत्रियांतक महावीर ॥ वडील अवतार ऋृषिपुत्र ॥ कर जोडोनि नमस्कार ॥ करी तयांतें राघव ॥६४॥

किंचित निवाला फरशधर ॥ मग बोले पंकजोद्भवपुत्र ॥ तुज देखोनि राघवेंद्र ॥ गजाखालीं उतरेना ॥६५॥

तूं वीर आणि विशेषें ब्राह्मण ॥ हा तुज कांहींच नेदी मान ॥ यथार्थ म्हणे भृगुनंदन ॥ लाविला बाण चापासी ॥६६॥

रघुपतीस म्हणे भृगुनंदन ॥ तूं क्षत्रिय म्हणवितोसी दारुण ॥ अधमा त्राटिका स्त्री वधून ॥ अधर्म केला साच पैं ॥६७॥

स्त्री रोगी मूर्ख बाळ ॥ योगी याचक अशक्त केवळ ॥ पंकगर्तेत अंध पांगुळ ॥ वृद्ध ब्राह्मण गाय गुरु ॥६८॥

ज्येष्ठबंधु मातापिता ॥ जो कां शस्त्र टाकोन होय पळता ॥ इतुक्यांवरी शस्त्र उचलितां ॥ महादोष बोलिला असे ॥६९॥

म्हणोनि तूं अधम वीर ॥ स्त्रीहत्या केली साचार । त्यावरी जानकीहृत्पद्मभ्रमर ॥ काय बोलता जाहला ॥२७०॥

म्हणे ताटिका नव्हे माझी माता ॥ तुवां मातृवध केला जाणता ॥ यापरीस काय अधमता ॥ उरली असे सांगपां ॥७१॥

उच्चवर्ण तूं ब्राह्मण ॥ सांडून अनुष्ठान तपाचरण ॥ तुज शस्त्र धरावया काय कारण ॥ राजहिंसा केलिया ॥७२॥

तूं ब्राह्मण परम पवित्र ॥ तुजवरी आम्ही धरावें शस्त्र । हे कर्म आम्हां अपवित्र ॥ ऋृषिपुत्रा जाणपां ॥७३॥

ऐसें ऐकतां फरशधर ॥ सोडी तात्काळ निर्वाण शर ॥ इकडे कोदंडासी बाण रघुवीर ॥ लाविला परी सोडीना ॥७४॥

कल्पांतचपळेसारिखे जाण ॥ येती भार्गवाचे तीक्ष्ण बाण ॥ ते दृष्टीनें पाहतां सीताजीवन ॥ जाती वितळोन क्षणार्धें ॥७५॥

जैसा झगटतां चंडपवन ॥ दीप सर्व जाती विझोन ॥ कीं शिवदृष्टीपुढें मदन ॥ न लागतां क्षण भस्म होय ॥७६॥

कीं प्रगटतां निर्वाणज्ञान ॥ मद मत्सर जाती पळोन ॥ कीं अद्भुत वर्षतां घन ॥ वणवा विझोन जाय जैसा ॥७७॥

जें जें टाकी अस्त्रजाळ ॥ तें तें दृष्टीनेंच विरे सकळ ॥ भार्गव म्हणे हा तमाळनीळ ॥ क्षीराब्धिवासी अवतरला ॥७८॥

आमुची सीमा जाहली येथून ॥ खाली ठेवी धनुष्यबाण ॥ गजाखालीं उतरोन सीताजीवन ॥ भेटावया धांविन्नला ॥७९॥

जैशा क्षीराब्धीच्या लहरी धांवती ॥ एकासी एक प्रीतीनें भेटती ॥ कीं अद्वैतशास्त्रींच्या श्रुती ॥ दोनी येती ऐक्यासी ॥२८०॥

राम फरशधर जेव्हां भेटले ॥ एकरूप दोन्हीचें ओतिलें ॥ कीं दोनी दीप एकचि जाहले ॥ तैसेंचि भासलें जनांसी ॥८१॥

एकस्वरूप दोघेजण ॥ कालत्रयीं न होती भिन्न ॥ भृगुपति रघुपति अभिधान ॥ परी दुजेंपण असेना ॥८२॥

जेणें निर्दाळिले सकळ क्षत्री ॥ ते क्रोधज्योति होती अंतरीं ॥ ती रघुपतीच्या मुखाभीतरीं ॥ प्रवेशली अकस्मात ॥८३॥

मग भार्गवासी म्हणे रघुनंदन ॥ म्यां जो चपासी लाविला बाण ॥ यास सांगें कांहीं कारण ॥ कोणीकडे टाकूं आतां ॥८४॥

परशुराम म्हणे स्वर्गमार्ग ॥ निरोधोनि टाकीं सवेग ॥ मी चिरंजीव होऊनि सांग ॥ तपचरण करीन ॥८५॥

तों निमिष न लागतां गेला बाण ॥ टाकिला स्वर्गमार्ग रोधून ॥ चिरंजीव केला भृगुनंदन ॥ हे कथा संपूर्ण नाटकीं असे ॥८६॥

असो अज्ञा घेऊनि तें वेळां ॥ भार्गव बद्रिकाश्रमीं गेला ॥ जनकासी निरोप दीधला ॥ तोही गेला मिथिलेसी ॥८७॥

इकडे नरवीरपंचानन ॥ देवाधिदेव रघुनंदन ॥ दळभारेंसी संपूर्ण ॥ अयोध्येसी पातला ॥८८॥

नगरांतून धांवती जन ॥ दृष्टीभरी पाहिला रघुनंदन ॥ साक्षात शेषनारायण ॥ अयोध्येंत प्रवेशती ॥८९॥

जें आत्म्प्राप्तीचें स्थान॥ तें अयोध्यानगर दैदीप्यमान ॥ प्रथम दुर्ग स्थूळदेह जाण ॥ सूक्ष्म आंतूनि दुसरें ॥२९०॥

कारणदुर्ग जाणिजे तिजें ॥ पुढें महाकारण ॥ दुर्ग विराजे ॥ षट्चक्रांची गोपुरें सतेजें ॥ ठायीं ठायीं झळकती ॥९१॥

असो नगराबाहेरूनि ॥ चारी अवस्था चारी अभिमानी ॥ हुडे झळकती पाहतां दुरोनि ॥ दिव्य तेज तळपतसे ॥९२॥

स्थूळ सूक्ष्म तत्वें बहुत ॥ या चर्या दाट झळकत ॥ पंच प्राण दशेंद्रियें तेथ ॥ वीर गर्जती ठायीं ठायीं ॥९३॥

भू नीर अनळ अनिल निराळ ॥ हेचि भांडीं वरी विशाळ ॥ शमदमांचे वृक्ष वरी निर्मळ ॥ सदां सफळ विराजती ॥९४॥

रज तम अविद्या केर ॥ नगरांत नाहीं अणुमात्र ॥ श्रवणचंदनसडे निरंतर ॥ चहूंकडे घातले ॥९५॥

मननाचिया रंगमाळा ॥ घरोघरी घातल्या निर्मळा ॥ शांतिकस्तूरीचा सुवास आगळा ॥ चहूंकडे येतसे ॥९६॥

निजध्यास तोरणें बहुत ॥ साक्षात्कार कळस झळकत ॥ कर्दळीस्तंभ विराजित ॥ मनोजयाचे चहूंकडे ॥९७॥

पूर्णानंदाचे कुंभ ॥ निजबोधें भरलें स्वयंभ ॥ आत्मप्रकाश दीप सुप्रभ चहूंकडे लखलखित ॥९८॥

अयोध्यावासियांच्या गळां ॥ सदा डोलती सुमनमाळा ॥ दयेचा तांबूल रंगला ॥ चतुर्थ मोक्षविशेष ॥९९॥

समाधि आणि सुलीनता ॥ सर्वांसी लाविल्या गंधाक्षता ॥ शुद्धसत्ववस्त्रें समस्तां ॥ मळ तत्वतां नसेचि ॥३००॥

चारी चौबारें बारा बिदी ॥ सोळा बाजार बहात्तर सांदी ॥ चौदा दासी त्रिशुद्धी ॥ पाणी वाहती अयोध्येंत ॥१॥

निरभिमानी चौसष्टजणी ॥ सदा विलसती श्रीरामसदनीं ॥ आणिक एक चारी आठजणी ॥ प्रीति करोनि राबती ॥२॥

अष्टभाव मखरें कडोविकडी ॥ नव महाद्वारें तेथें उघडीं ॥ ऊर्ध्वमुख निजप्रौढीं ॥ दशमद्वार झांकिलें ॥३॥

अष्टांगयोगी रामभक्त ॥ तेचि त्या द्वारें येत जात ॥ आणिकांस तो न सांपडे पंथ ॥ असे गुप्त सर्वदा ॥४॥

चतुर्दश रत्नें साधोनि वृत्रारि ॥ जैसा प्रवेशे अमरपुरीं ॥ कौसल्यात्मज ते अवसरीं ॥ तैसा अयोध्येंत प्रवेशला ॥५॥

सफळ देखोनि दिव्य द्रुम ॥ बहुत धांवती विहंगम ॥ तैसा पहावया आत्माराम ॥ नगरजन धांवती ॥६॥

देव वर्षती सुमनसंभार ॥ धडकत वाद्यांचा गजर ॥ मंडपघसणी झाली थोर ॥ श्रीराम पहावयाकारणें ॥७॥

देखोनियां रामचंद्र ॥ वेधले जनननयनचकोर ॥ उंचबळला सुरसमुद्र ॥ प्रेमभरतें दाटलें ॥८॥

कीं राम देखतां दिनमणी ॥ टवटविल्या निजभक्तकमळिणी ॥ सकळ लोकां अलंकारलेणीं ॥ राघवेंद्रे दीधली ॥९॥

भांडारें फोडोनि दशरथें ॥ निजधन वांटिलें याचकांतें ॥ गजारूढ बंदिजन तेथें ॥ सूर्यवंश वाखाणिती ॥३१०॥

निजात्मसदनीं रघुनाथ ॥ सीतेसहित प्रवेश समर्थ ॥ तनमनधनेंसी यथार्थ ॥ मूद वरोनि ओंवाळिजे ॥११॥

रामविजयग्रंथ प्रचंड ॥ येथें संपलें बालकांड ॥ पुढें अयोध्याकांड परम गोड ॥ श्रवणें कोड पुरवी पैं ॥१२॥

अग्राकडोनि इक्षुदंड ॥ मूळाकडे विशेष गोड ॥ सप्तकांड तैसा हा इक्षुदंड ॥ बहुत रसाळ पुढें पुढें ॥१३॥

पापपर्वत जडभार ॥ रामविजय त्यावरी वज्र ॥ संतश्रोते पुरंदर ॥ चूर्ण करिती निजबळें ॥१४॥

श्रीमद्भीमातटविलासा ॥ ब्रह्मानंदा पंढरीशा ॥ श्रीधरवरदा पुराणपुरुषा ॥ अभंगा अविनाशा अक्षया ॥१५॥

स्वति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत श्रोते चतुर ॥ अष्टमाध्याय गोड हा ॥३१६॥

श्रीरामचंद्रापर्णमस्तु ॥

श्रीरामविजयअध्याय वा

श्रीगणेशाय नमः ॥

श्रीरामचंद्राय नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥

नमू श्रीगुरुब्रह्मानंद ॥ जो जगदंकुरमूळकंद ॥ जो निजजनतारक प्रसिद्ध ॥ कैवल्यदाता सुखाब्धि ॥१॥

जो योगद्वीपींचें निधान ॥ जो वैराग्यवल्लीचें सुमन ॥ कीं वेदांतसमुद्रींचा मीन ॥ आत्मजीवनीं तळपतसे ॥२॥कीं तो धर्ममेरूचें शिखर ॥ कीं चिदाकाशींचा जलधर ॥ कीं कृपासागरींचें सुंदर ॥ दिव्य रत्न प्रकटलें ॥३॥

कीं शांतीचें चंद्रमंडळ ॥ कीं सत्यतेजें सूर्य केवळ ॥ कीं सत्त्वसरोवरींचें कमळ ॥ किंवा सुफळ आनंदवृक्ष ॥४॥

कीं क्षमामलयपर्वत पूर्ण ॥ कीं निर्विकार दिव्य चंदन ॥ मुमुक्षु फणिवर वेष्टून ॥ सर्वदाही बैसले ॥५॥

कीं शुद्धब्रह्म भागीरथीजळ ॥ तेथींचा लोट अति निर्मळ ॥ भक्ति विरक्ति ज्ञान केवळ ॥ तीर्थराज अवतरला ॥६॥

ऐसा महाराज श्रीगुरुनाथ ॥ त्यासी परिसाचा देऊं दृष्टांत ॥ तो लोहाचें सुवर्ण करित ॥ परी आपणाऐसें न करवे ॥७॥

सुरभि चिंतामणि साचार ॥ कल्पवृक्ष म्हणावा उदार ॥ तरी तो कल्पिलेंचि देणार ॥ परी आपणाऐसें न करवे ॥८॥

जनकजननीची उपमा कैशी ॥ द्यावी आतां सद्रुरूशी ॥ तीं जन्मदायक निश्र्चयेंसी ॥ हा जन्ममरणांसी दूर करी ॥९॥

चौऱ्यांशीं लक्ष योनि अमूप ॥ सर्वांठायीं असती मायबाप ॥ परी सद्रुरु दुर्लभ चित्स्वरूप ॥ जन्मोजन्मीं कैंचा तो ॥१०॥

जो भवइंधनदाहक वैश्र्वानर ॥ अज्ञानतिमिरच्छेदक दिवाकर ॥ कीं दुःखपर्वतभंजन पुरंदर ॥ बोधवज्र झळके वरी ॥११॥

ऐसा महाराज गुरुनाथ ॥ त्यासी शिष्य विरक्त शरणागत ॥ भ्रमर पद्मकोशीं बैसत ॥ तैसे लुटित चरणरज ॥१२॥

कीं स्फुलिंग मिळे अग्नींत ॥ कीं जळबिंदु पडे सरोवरांत ॥ कीं सरिता-सागरीं ऐक्य होत ॥ ऐसे भक्त गुरुचरणीं ॥१३॥

कीं मुशींत आटिले अलंकार ॥ कीं जळीं विरे जळगार ॥ कीं तरंग मोडून साचार ॥ एक नीर उरे पैं ॥१४॥

ऐसें गुरुचरणीं मिळोन ॥ गुरुदास्य करित अनुदिन ॥ क्षीराब्धीमाजी उपमन्य ॥ विलसे जैसा सर्वदा ॥१५॥

कीं जान्हवींत मणिकर्णिका तीर्थ ॥ कीं भीमेंत चंद्रभागा विख्यात ॥ तैसे भजनगंगेत यथार्थ ॥ गुरुभक्त वंद्य पैं ॥१६॥

ऐसें ऐकतां गुरुस्तवन ॥ परम आनंदले संतजत ॥ धन्य धन्यरे म्हणोन ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥१७॥

ऐसे देखोन श्रीधरें ॥ नमस्कार घातला प्रेमादरें ॥ म्हणे तुम्ही रामकथामृतपात्रें ॥ सादर श्रवणीं बैसलां ॥१८॥

तुम्ही ज्ञानगंगेचे ओघ निर्मळ ॥ कीं विवेकभूमींचीं निधानें केवळ ॥ कीं कृपार्णवींची जाहाजें सबळ ॥ क्षमाशीड वरी तळपे ॥१९॥

कीं नवविधभक्तीचीं दिव्य द्वीपें सुंदर ॥ कीं अनुभवशास्त्रींचीं मंदिरें ॥ कीं पिकलीं आनंददक्षेत्रें ॥ समसमान चहूंकडे ॥२०॥

परोपकारनभींचीं नक्षत्रें निर्मळ ॥ परम गुणप्रिय मुक्तमराळ ॥ कीं शब्दरत्नग्राहक सकळ ॥ या ग्रंथश्रवणीं मिळाले ॥२१॥

कीं रामकथाकमळिणीचें भ्रमर ॥ कीं अवधानदाते जलधर ॥ माझे शब्द आरुष निर्धार ॥ परी तुम्ही प्रीति ठेविली ॥२२॥

रानपक्षी शुक यथार्थ ॥ त्याचे बोल ऐकतां तटस्थ ॥ होती शास्त्रज्ञ पंडित ॥ तैसेंचि येथें जाहलें ॥२३॥

कीं बोबडें बोलतां बालक ॥ अत्यंत संतोषे जनक ॥ तैसें शब्दांचें कौतुक ॥ संतजन करिती पैं ॥२४॥

तरी आतां इतुकेंच करा सत्वर ॥ सादरता हे दिव्य अलंकार ॥ मजलागीं देऊन साचार ॥ संतजनीं गौरवावें ॥२५॥

वक्ताक्षेत्र पिकलें पूर्ण ॥ परी सादरता पाहिजे वरी घन ॥ चित्तव्याकुळता हें अवर्षण ॥ तेणें मोड करपती ॥२६॥

बोलती संत श्रोते चतुर ॥ तुमचीं वचनें हा सुधाकर ॥ येणें आमुचे कर्णचकोर ॥ तृप्त जाहले निर्धारें ॥२७॥

असो आतां वाग्वल्ली सुंदरी ॥ चढे अयोध्याकांडमंडपावरी ॥ तेथींची फळें निर्धारीं ॥ भक्तचतुरीं सेविजे ॥२८॥

मागें अष्टमाध्यायीं कथन ॥ जानकी परिणिली कोदंड भंगोन ॥ त्यावरी भृगुपतीचा दर्प हरोन ॥ रघुपति आला अयोध्ये ॥२९॥

कैकयीचा बंधु विख्यात ॥ परम प्रतापी संग्रामजित ॥ मान देऊनि बहुत ॥ लग्नासी आणिला दशरथें ॥३०॥

मिथिलेचा लग्न सोहळा पाहून ॥ अयोध्येसी आला परतोन ॥ कैकयीस म्हणे भरत शत्रुघ्न ॥ नेऊं आपले ग्रामातें ॥३१॥

ऐकोन बंधूचें वचन ॥ येरी म्हणे अवश्य जा घेऊन ॥ परी रायातें पुसोन ॥ मग दोघांतें नेइंजे ॥३२॥

दशरथास पुसे संग्रामजित ॥ मास एक शत्रुघ्न आणि भरत ॥ स्वराज्यासी नेऊन त्वरित ॥ आणून मागुती पोंचवूं ॥३३॥

अवश्य म्हणोनि अजसुत ॥ कैकयी भरतासी सांगत ॥ तुवां मातुलगृहासी जावें त्वरित ॥ शत्रुघ्नासी घेऊनियां ॥३४॥

भरत म्हणे श्रीरामावांचून ॥ मज न गमे एकही क्षण ॥ रघुपतीचे सेवेविण ॥ न रुचे मज आन कांहीं ॥३५॥

श्रीराम चंद्र मी चकोर ॥ मी चातक रघुवीर अंबुधर ॥ राम सुरभि मी वत्स साचार ॥ वियोग सहसा सोसेना ॥३६॥

श्रीरामसेवा सांडोन ॥ इतर सुखें इच्छी कोण ॥ पीयूषतुल्य अन्न टाकून ॥ कोण वमन विलोकी ॥३७॥

मुक्ताफळें हंस टाकोन ॥ प्राणांतींही न भक्षी शेण ॥ कल्पद्रुमींचा विहंगम जाण ॥ बाभुळेवरी न बैसे ॥३८॥

घृतमधुदुग्धसरोवर ॥ जरी सुरसें भरलें अपार ॥ परी जीवन सांडूनि जलचर ॥ कदा तेथें न जाती ॥३९॥

ऐसें बोलतां भरत ॥ नेत्रीं आले अश्रुपात ॥ माता म्हणे एक मासापर्यंत ॥ क्रमोनि येईं सवेंचि ॥४०॥

नुल्लंघवे मातृवचन ॥ भरत श्रीरामास पुसे येऊन ॥ मग बोले जानकीमनमोहन ॥ बा रे लौकरी येइंजे ॥४१॥

भरतशत्रुघ्नीं ते वेळे ॥ रघुवीरचरण वंदिले ॥ चतुरंग दळ सिऋृ जाहलें ॥ रथीं बैसले दोघेही ॥४२॥

राया दशरथाचे कुमार ॥ श्रीरामचरणाब्जभ्रमर ॥ मातुलग्नामासी सत्वर ॥ दळभारेंसी पातले ॥४३॥

इकडे अयोध्येसी रामलक्ष्मण ॥ सर्वदा करिती गुरुसेवन ॥ तैसेंचि दशरथाचें भजन ॥ रघुनंदन करीतसे ॥४४॥

वसिष्ठमुखें नित्य विद्या श्रवण ॥ श्रीराम करितसे आपण ॥ चतुःषष्टिकलाप्रवीण ॥ रघुनंदन जाहला ॥४५॥

मग धनुर्विद्येचा अभ्यास ॥ करिता परमपुरुष ॥ रंगभूमि साधूनि विशेष ॥ युद्धकळा शिके तेथें ॥४६॥

वेणुमस्तकीं घालितां कुठोर ॥ चिरत जाय जैसा दूर ॥ तैशी श्रीरामबुद्धि तीव्र ॥ तर्क अपार पावतसे ॥४७॥

वसिष्ठ धनुष्यबाण घेऊन ॥ जें जें मांडून दावी ठाण ॥ त्याहूनि विशेष रघुनंदन ॥ दावी करून गुरूसी ॥४८॥

अस्त्रशस्त्रविद्याप्रवीण ॥ जाहले राम आणि लक्ष्मण ॥ ते परीक्षा पहावया अजनंदन ॥ रंगमंडपीं बैसला ॥४९॥

रंगमंडपाची रचना ॥ न वर्णवेचि सहस्रवदना ॥ तें तेज विलोकितां सहस्रकिरणा ॥ परमाश्र्चर्य वाटतसे ॥५०

शशांकप्रभासम पूर्ण ॥ कोरिले काश्मीर पाषाण ॥ त्यांची पोंवळीप्रभा घन ॥ सभोंवती रचियेली ॥५१॥

त्यामाजी सप्तरंगीं पाषाण ॥ चक्रजाळ्या चौकटी पूर्ण ॥ माजी घातल्या दारुण पाहतां आश्र्चर्य वाटतसे ॥५२॥

साधिलें पाचुबंद आंगण ॥ गरुडपाचूंचीं जोतीं पूर्ण ॥ निळयाचे गज घडोन ॥ तेचि तोळंबे लाविले ॥५३॥

त्यावरी हिरेयाचे स्तंभ ॥ वरी वैडूर्यउथाळीं स्वयंभ ॥ सुवर्णाची तुळवटें सुप्रभ ॥ लंबायमान पसरलीं ॥५४॥

गरुडपाचूचे दांडे विराजती ॥ आरक्त माणिककिलचा झळकती ॥ चर्याशेषफणाकृती ॥ जैसे गभस्ती वळीनें ॥५५॥

एकावरी एक नवखण ॥ तेथें रात्रीस नाहीं कारण ॥ जेथें गरुडपाचूचे रावे पूर्ण ॥ शब्द करिती नवल हें ॥५६॥

निळयाचे मयूर धांवती ॥ रत्नांचीं गोलांगुलें नाचती ॥ छप्पन्न देशींच्या नृपाकृती ॥ चित्रें भिंतीवरी पैं ॥५७॥

खांबसूत्रींच्या पुतळिया ॥ नाचती गिरक्या घेऊनियां ॥ नृसिंहमूर्ती स्तंभांतूनियां ॥ हुंकारिती क्षणक्षणां ॥५८॥

ऐशिया रंगमंडपांत ॥ बैसता झाला द्विपंचरथ ॥ वसिष्ठादि ऋषि समस्त ॥ अष्टाधिकारी आणि प्रजा ॥५९॥

मंडपजाळीवाटे तत्वतां ॥ पाहती कौसल्यादि माता ॥ श्रीरामें विद्या साधिल्या समस्ता ॥ देखावया आस्था सकळांची ॥६०॥

जैसा नक्षत्रांमाजी अत्रिसुत ॥ तैसा सभेसी राजा दशरथ ॥ इंद्राजवळी बृहस्पती बुद्धिमंत ॥ तैसा वसिष्ठ बैसला ॥६१॥

असो रंगमंडपापुढें दोघेजण ॥ श्रीराम आणि लक्ष्मण ॥ पाचुबंद अंगणीं येऊन ॥ उभे ठाकले तेधवां ॥६२॥

जैसे शशी आणि चंडकिरण ॥ कीं अपर्णावर आणि रमारमण ॥ कीं मेरुमांदार स्वरूपें धरून ॥ उभे ठाकले रणांगणीं ॥६३॥

साक्षात् शेषनारायण ॥ अवतारपुरुष दोघेजण ॥ अनंत जन्मींचें तपाचरण ॥ दशरथाचें फळां आलें ॥६४॥

कोटिकंदर्पलावण्यखाणी ॥ तेजासी उणा वासरमणी ॥ कीं अनंत विजा पिळूनी ॥ रामरूप ओतलें ॥६५॥

तो लावण्यमृतसागर ॥ आजानबाहु श्रीरघुवीर ॥ गुरु आणि पितयासी नमस्कार ॥ करोन शस्त्रें वंदिलीं ॥६६॥

नानावाहनीं आरूढोनि रघुपति ॥ दावी युद्धाच्या अगाध रीति ॥ रथ फिरवी नानागती ॥ विस्मित पाहती जन सर्व ॥६७॥

मग दावी कुंजरयानफेरी ॥ सवेंचि तुरंगारूढ होय झडकरी ॥ रथचमक दावी नानापरी ॥ अलातचक्र जैसें कां ॥६८॥

चरणयुद्ध अस्त्रयुद्ध ॥ शस्त्ररिति नानाविध ॥ मल्लमेषकुंजरयुद्ध ॥ व्याघ्रसिंहयुद्धगती ॥६९॥

कूर्मवृषभनक्रयुद्ध ॥ जलमंडलयुद्धविशद ॥ अंतरिक्ष भूमि गदा प्रसिद्ध ॥ सकळ कलायुद्ध दाविलें ॥७०॥

शक्ति पाशुपत तोमर ॥ शूल परिघ लहुडी चक्र ॥ कंदुक भिंडिमाळा वज्र ॥ दावी रघुवीर गति त्यांची ॥७१॥

पाश असिलता मुद्रल ॥ शतघ्नी फरशांकुश कुंतसरळ ॥ यमदंष्ट्रा शब्दयुद्ध सबळ ॥ यंत्रमंत्रयुद्धगती ॥७२॥

नेत्र झांकोनि सोडी बाण ॥ पुढें पाहे मागें भेदी जाण ॥ दळसिंधू परतटाकगमन ॥ राजीवनयन दावीतसे ॥७३॥

एक सांडितांचि बाण ॥ कोट्यावधि व्हावे त्यापासून ॥ सकळ चमूचें शिरच्छेदन ॥ एकाचि बाणें करावें ॥७४॥

अग्न्यस्त्र पर्जन्यास्त्र ॥ वात पर्वत आणि वज्र ॥ माया ब्रह्म माहेश्र्वर ॥ भूतास्त्र पैं ॥७५॥

सिंह सर्प आणि गरुडास्त्र ॥ कामवैराग्य तारकासुर ॥ पाप नाम गंधर्वास्त्र ॥ दावी रघुवीर अस्त्रें हीं ॥७६॥

ब्रह्मशिरी विश्र्वजित ॥ या अस्त्रगति दावी रघुनाथ ॥ तैसेंचि करी सुमित्रासुत ॥ मान दशरथ डोलवी ॥७७॥

वसिष्ठ उठोनि ते अवसरीं ॥ श्रीरामसौमित्रांसी हृदयीं धरी ॥ दशरथाचा आनंद अंबरीं ॥ न समाये तेव्हां सर्वथा ॥७८॥

सभा विसर्जून दशरथ ॥ वसिष्ठ सौमित्र रघुनाथ ॥ प्रवेशते जाहले सदनांत ॥ आनंदयुक्त सर्वही ॥७९॥

यावरी एके दिवशी अजनंदन ॥ दर्पणीं विलोकीं निजवदन ॥ तों दाढींत शुभ्र केश देखोन ॥ काय बोलता जाहला ॥८०॥

म्हणे शीघ्र बोलवा ब्रह्मनंदन ॥ अष्टाधिकारी ऋषि प्रजाजन ॥ सकळ व्यवहारी वैश्यजन ॥ विवेकसंपन्न थोर थोर ॥८१॥

सकळांसी बैसवोनि एकांतीं ॥ निजगुह्य पुसे कौसल्यापति ॥ म्हणे राज्य द्यावें रामाप्रति ॥ ऐसें चित्तीं वाटतसे ॥८२॥

राज्यासी योगय रघुनायक ॥ जो गुणसमुद्र प्रतापार्क ॥ जो धीर वीर उदार देख ॥ लावण्यासागर श्रीराम ॥८३॥

अनंत जन्मींच्या तपाचे फळ ॥ तो हा श्रीराम तमालनीळ ॥ राज्य द्यावें हो तात्काळ ॥ सुमुहूर्त वेळ पाहोनियां ॥८४॥

ऐकोनि दशरथाचें वचन ॥ संतोषला ब्रह्मनंदन ॥ मानवले समस्त प्रजानन ॥ म्हणती धन्य धन्य दशरथा ॥८५॥

वसिष्ठादि ऋृषि समस्त ॥ पाहोनि उत्तम सुमुहूर्त ॥ चैत्रमास अतिविख्यात ॥ गुरुपुष्ययोग साधिला ॥८६॥

श्रीरामासी द्यावया राज्यपट ॥ सुमुहूर्त नेमिला अतिवरिष्ठ ॥ सर्व सामुग्री वसिष्ठ ॥ सिद्ध करिता पैं जाहला ॥८७॥

श्र्वेतवर्ण चौदंती गज ॥ क्षीरवर्ण आणिला हयराज ॥ छत्रचामरें तेजःपुंज ॥ मृगांकवर्ण साजिरीं ॥८८॥

पंचपल्लव सप्तमृत्तिका परिकर ॥ चतुःसमुद्रींचें आणिले नीर ॥ दिव्य सिंहासन पवित्र ॥ नूतन छत्र निर्मिलें ॥८९॥

दिव्य मंडप निर्मून ॥ तेथें मांडिलें सिंहासन ॥ जपासी बैसविले दिव्य ब्राह्मण ॥ वेदोनारायण साक्षात ॥९०॥

छप्पन्न देशींचे राजेश्र्वर ॥ शाण्णव कुळीचे राजकुमार ॥ ते येत जाहले समग्र ॥ अपार करभार घेऊनियां ॥९१॥

आनंदमय अयोध्यानगर ॥ सदनें श़ृंगारिलीं सुंदर ॥ अयोध्यावासी नारी नर ॥ मंडित समग्र अलंकारें ॥९२॥

राजमंदिरें श़ृंगारिलीं विशेष ॥ वरी झळकती रत्नजडित कळस ॥ उणें आणिती उडुगणांस ॥ रजनीमाजी स्वतेजे ॥९३॥

एकांतीं बोलावूनि रघुनाथ ॥ गुह्य गोष्टी सांगें दशरथ ॥ म्हणे बारे मज ग्रहपीडा आली बहुत ॥ काळ विपरीत पुढें दिसे ॥९४॥

अष्टमस्थानीं शनैश्र्वर निश्र्चिती ॥ द्वादशस्थानीं जाण बृहस्पति ॥ बारे मज मृत्युचिन्हें जाणवती ॥ बैसें रघुपति सिंहासनीं ॥९५॥

रामा तुझी मज वाटे खंती ॥ मज टाकोनियां रघुपति ॥ दूरी जाशील निश्र्चिती ॥ हेंचि चित्तीं वाटतसे ॥९६॥

तरी लावण्यामृतसागरा ॥ तमालनीळा राजीवनेत्रा ॥ श्रीराम घनश्यामगात्रा ॥ राज्य भारी चालवीं ॥९७॥

श्रीरामेंवंदिले पितृचरण ॥ म्हणे मज आज्ञाचि प्रमाण ॥ रामसीतेसी उपोषण ॥ करवी वसिष्ठ ते दिवशीं ॥९८॥

रघुनाथाहातीं दानें ॥ अपार करविलीं ब्रह्मनंदनें ॥ राम जानकी दोघेजणें ॥ कुशासनीं पहुडविलीं ॥९९॥

जो पुराणपुरुष परब्रह्म ॥ तया हातीं ऋृषि करवी होम ॥ आहुती घाली पुरुषोत्तम ॥ दृष्टांत उत्तम ऐका ते ॥१००

चकोराचे मुखीं अमृतधार ॥ वर्षें जैसा रोहिणीवर ॥ कीं धेनु पान्हा घाली सत्वर ॥ वत्सासी तृप्त व्हावया ॥१॥

कीं बाळकाचिया मुखांत ॥ माता स्तनपानें करी तृप्त ॥ कीं जलद बिंदु टाकी अकस्मात ॥ चातकमुखीं कृपेनें ॥२॥

ऐसीं अवदानें राम टाकित ॥ धूमे्रं नेत्र जाहले आरक्त ॥ यज्ञनारायण जाहला तृप्त ॥ राघवहस्तेंकरोनियां ॥३॥

जैसी गौतमी आणि भागीरथी ॥ तैसी कौसल्या आणि सुमित्रा सती ॥ विप्रांसी दानें अपार देती ॥ आनंद चित्तीं न समाये ॥४॥

दशरथासी विनवी लक्ष्मण ॥ मी श्रीरामसेवा करीन ॥ ऐकोन संतोषे अजनंदन ॥ कुरवाळी वदन सौमित्राचें ॥५॥

अयोध्यानगर वेष्टोनि जाणा ॥ उतरल्या राजयांच्या पृतना ॥ कोणी करी तयांची गणना ॥ पाहतां नयनां भुलवणी ॥६॥

श्रीराम बैसे राज्यपटीं ॥ तो सोहळा पहावया दृष्टीं ॥ सकळ सुरवरांच्या कोटी ॥ विमानारूढ पाहती ॥७॥

तंत वितंत घन सुस्वर ॥ चतुर्विध वाद्यांचा गजर ॥ नादें कोदलें अंबर॥ चिंतातुर सुर जाहले ॥८॥

निर्जर विनीविती कमलोद्भवा ॥ दशरथ राज्य समर्पी राघवा ॥ आमुचे बंदिसुटकेचा बरवा ॥ विचार कांहीं दिसेना ॥९॥

इंद्रपदातुल्य राज्य अपूर्व ॥ तें सोडोनियां सीताधव ॥ कासया येईल दशग्रीव ॥ वधावयाकारणें ॥११०॥

जरी तो मंगलभगिनीचा वर ॥ भक्तालागीं जाहला साकार ॥ तरी तपोवना येईल रघुवीर ॥ ऐसा विचार योजावा ॥११॥

मग विरिंचि सांगे विकल्पासीं ॥ तुवां सत्वर जावें अयोध्येसी ॥ प्रवेशावें कैकयीच्या मानसीं ॥ विघ्न राज्यासी करावें ॥१२॥

विकल्प म्हणे ते वेळां ॥ अयोध्येमाजी परम सोहळा ॥ दुःख द्यावयासी सकळां ॥ माझेनि तेथें न जाववे ॥१३॥

माझा प्रवेश होतां तेथ ॥ बहुतांसी होईल प्राणांत ॥ मांडेल एकचि अनर्थ ॥ माझेनि तेथें न जाववे ॥१४॥

शीतळ होईल वडवानळ ॥। मधुरता धरील हाळाहळ ॥ परी मज विकल्पाचें बळ ॥ क्षीण नव्हे कल्पांतीं ॥१५॥

देव म्हणती तुजविण ॥ हें कार्य साधील कवण ॥ आम्हां सोडवीं बंदींतून ॥ घेई पुण्य तूं एवढें ॥१६॥

ऐसें ऐकत चि वचन ॥ विकल्प निघाला तेथून ॥ जवळ केले अयोध्यापट्टण ॥ परी भीतरीं न जाववेचि ॥१७॥

अयोध्यावासी पुण्यशीळ ॥ सत्यवादी सात्विक प्रेमळ ॥ ज्यांकडे पाहों न शके काळ ॥ तेथें विकल्प प्रवेशेना ॥१८॥

ज्यांसी वेदाज्ञा वाटे प्रमाण ॥ नेणती परांचे दोष-गुण ॥ सदा सारासार विचार श्रवण ॥ तेथें विकल्प बाधीना ॥१९॥

जे निःसीम गुरुभक्त ॥ जे मातापित्यांसी भजत ॥ जे अनन्यब्राह्मणांसी वंदित ॥ तेथें विकल्प बाधीना ॥१२०॥

सदा आवडे हरिभजन ॥ श्रवण मनन हरिकीर्तन ॥ परद्रव्य ज्या तृणासमान ॥ तेथें विकल्प बाधीना ॥२१॥

दया उपजे देखतां दीन ॥ अंध पंगु वृद्ध क्षीण ॥ त्यांसी पाववी वस्त्र अन्न ॥ तेथें विकल्प बाधीना ॥२२॥

परललना मातृवत् ॥ जे वादप्रतिवादीं मुके होत ॥ जे ईश्र्वररूप पाहती संत ॥ तेथें विकल्प बाधीना ॥२३॥

सर्वांभूतीं एक रघुनाथ ॥ ऐशी जयांसी पूर्ण प्रचीत ॥ प्रपंचीं वर्ततां विरक्त ॥ तेथें विकल्प बाधीना ॥२४॥

जे ब्रह्मानंदीं पूर्ण धाले ॥ जे आपणा आपण विसरले ॥ तेथें विकल्पाचें बळ न चले ॥ कल्पांतींही सर्वथा ॥२५॥

असो पुण्यवंत अयोध्येचे जन ॥ त्यांसी विकल्प पळे देखतां दुरून ॥ प्रवेशावया अयोध्यापट्टण ॥ सामर्थ्य नव्हे सहसाहि ॥२६॥

तों कैकयीची दासी मंथरा ॥ ते पूर्वींच द्वेषी रघुवीरा ॥ परम पापिणी सीतावरा ॥ सर्वदाहि निंदितसे ॥२७॥

प्रातःकाळीं अहिल्योद्धार ॥ सेजेसीं असतां रामचंद्र ॥ झाडितां बळेंचि केर ॥ रामावरी घालित ॥२८॥

तो अंगावरी येतां केर ॥ दैवहत होईल वज्रधर ॥ म्हणोन ते दासी अपवित्र ॥ रामावरी रज उडवी ॥२९॥

प्रत्यहीं ऐसेंचि करित ॥ देखतां क्रोधावला जनकजामात ॥ म्हणे तूं कुब्जा होईं यथार्थ ॥ कुरूप वक्र सर्वांगीं ॥१३०॥

मग ते लागे श्रीरामापायीं ॥ म्हणे राघवा मज उश्शाप देई ॥ मग जगदानंदकंद ते समयीं ॥ काय बोलता जाहला ॥३१॥

म्हणे पुढील अवतारीं पूर्ण ॥ कंसावधार्थ मथुरे येईन ॥ तेव्हां तुज उद्धरीन ॥ दिव्य करीन रूप तुझें ॥३२॥

असो अयोध्येबाहेर दूर ॥ पुष्पवाटिका परम सुंदर ॥ सदा सुफळ तरुवर ॥ विकल्प सत्वर आला तेथें ॥३३॥

जो भुवनच्छेदक कुठार ॥ कीं स्नेहकर्पूरदाहक वैश्र्वानर ॥ कीं प्रीतिमेघविदारक समीर ॥ परम तीव्र स्वरूप ज्याचें ॥३४॥

हा भजनमार्गींचा मारक मांग ॥ परम द्वेषी विष्ठाभक्षक काग ॥ कीं द्वेषवारुळांतील भुजंग ॥ धुसधुसीत विकल्प हा ॥३५॥

तो मत्सरवनींचा वृक थोर ॥ कीं निर्दयसमुद्रींचा नक्र ॥ कीं परनिंदाजल्पक खर ॥ विकल्प साचार जाणिजे ॥३६॥

विकल्प नोहे तो श्र्वान ॥ धांवे भक्तांवरीं वसवसोन ॥ आनंदरसपात्र उलंडोन ॥ न लागतां क्षण टाकितो ॥३७॥

असो हिंवरवृक्षीं तो विकल्प ॥ बैसला असे सुखरूप ॥ तंव तेथें मंथरा पापरूप ॥ पुष्पें न्यावया पातली ॥३८॥

हिंवरछायेसी ते अवसरी ॥ मंथरा बैसली क्षणभरी ॥ विकल्प प्रवेशला तिच्या अंतरीं ॥ अत्यंत कुपात्र देखोनियां ॥३९॥

जो कां निर्दय आचारहीन ॥ नावडे हरिकथा पुराणश्रवण ॥ सदा जल्पत परदोषगण ॥ विकल्प येऊन राहे तेथें ॥१४०॥

साधु संत ब्राह्मण त्यांसी द्वेषी रात्रंदिन ॥ भूतदया नावडे मनांतून ॥ विकल्प येऊन राहे तेथें ॥४१॥

वेदाविरुद्ध जे वर्तत ॥ नसतेंचि वाढविती कुमत ॥ कोठें विश्र्वास न धरी चित्त ॥ विकल्प येऊन राहे तेथें ॥४२॥

असो मंथरेचे मनीं ॥ विकल्प संचरला ते क्षणीं ॥ तों पक्व काळिंगण देखोन नयनीं ॥ प्रीतीकरोनि भक्षित ॥४३॥

पुष्पें वेचितां कुश्र्चळ ॥ मनीं उठती द्वेषकल्लोळ ॥ गृहास परतली तात्काळ ॥ कलह प्रबल लावावया ॥४४॥

तों कैकयीचे गृहीं सोहळा होत ॥ मंडप उभविले नभचुंबित ॥ जन अवघे आनंदभरित ॥ चिंतारहित सर्वहि ॥४५॥

ऐसें मंथरेनें देखतां ॥ परम द्वेष वाटे चित्ता ॥ जैशा वसंतीं कोकिळा गर्जतां ॥ दुःख वायसां उपजे पैं ॥४६॥

आम्र येतां पाडास ॥ मुखरोग प्राप्त होय कागांस ॥ दृष्टीं देखतां राजहंस ॥ दुःख विशेष वाटे तयां ॥४७॥

कीं देखोन संतांच्या मूर्ती ॥ निंदक संतापती चित्तीं ॥ देखोन पंडितांची व्युत्पत्ती ॥ अयोग्या चित्तीं द्वेष वाटे ॥४८॥

कीं देखोन मृगेंद्राचा प्रताप ॥ श़ृगालासी चढे संताप ॥ कीं देखोनि श्रीमंताचें स्वरूप ॥ जेंवी दुर्जन चरफडती ॥४९॥

कीं देखोन धार्मिकाची लीला ॥ अपवित्रासी खेद आगळा ॥ कीं पतिव्रता देखोनि डोळां ॥ व्यभिचारिणी वीटती ॥१५०॥

 

शशांक देखतां विटती तस्कर ॥ दिवाभीतां नावडे दिनकर ॥ कीं हिंसकांस तत्त्वविचार ॥ मनींहून नावडे ॥५१॥

तैसा सोहळा देखोन मानसीं ॥ परम संतापली ते दासी ॥ रामनिधानासी विवसी ॥ आड आली साक्षेपें ॥५२॥

ते कलहपीठींची देवता ॥ कीं ते दुःखकल्लोळप्रवाहसरिता ॥ गृहांत अग्नि लागे अवचिता ॥ तैशी आंत प्रवेशली ॥५३॥

आंगणीं शरीर टाकी तात्काळ ॥ धबधबां पिटी वक्षःस्थळ ॥ कैकयीस म्हणे तूं केवळ ॥ अभागीण सर्वस्वें ॥५४॥

अगे बुद्धिहीन सर्वांत ॥ तुझें तुज न कळे हित ॥ मातुळगृहीं पाठविले तुझे सुत ॥ राज्यीं रघुनाथ स्थापिती ॥५५॥

तुज अवदशा आली यथार्थ ॥ सौभाग्य गेलें वाहात ॥ देशधडी केला भरत ॥ तुज अनर्थ समजेना ॥५६॥

राज्यीं बैसतां रघुनंदन ॥ तुझे पुत्र टाकील वधोन ॥ कैकयी तुज शिकवील कोण ॥ मजवांचून बुद्धि आतां ॥५७॥

मग तिजप्रति कैकयी बोलत ॥ मज भारत तैसाच रघुनाथ ॥ तूं हा खेद न करी यथार्थ ॥ कदा अनर्थ करूं नये ॥५८॥

ऐसें बोलोनि सत्वर ॥ कंठींचें पदक आणि हार ॥ तिच्या गळ्यांत घाली परिकर ॥ दासी आपुली म्हणोनि ॥५९॥

पदक आणि मुक्तामाळा ॥ मंथरेनें तोडून टाकिल्या ॥ तोंड घेतलें ते वेळां ॥ राज्य बुडालें म्हणोनी ॥१६०॥

स्नेहें धांवोनि कैकयी ॥ तीस धरती झाली हृदयीं ॥ विकल्प प्रवेशला ते समयीं ॥ चित्तगृहीं कैकयीच्या ॥६१॥

कैकयी तीस म्हणे ते समयीं बरी युक्ति योजलीस लवलाहीं तूं माझी प्राणसखी होसी पाहीं ॥ करूं कायी सांग आतां ॥६२॥

भरत तो नाहीं जवळी ॥ रामासी राज्य देती प्रातःकाळीं ॥ अयोध्यावासी लोक सकळी ॥ श्रीरामाकडे मुरडले ॥६३॥

वसिष्ठ आणि दशरथ ॥ यांसी प्राणाहून आवडे रघुनाथ ॥ ते तों माझा वचनार्थ ॥ न मानिती कदाही ॥६४॥

मंथरा म्हणे ऐक साचार ॥ पूर्वींचे मागें दोन वर ॥ तुवां रथ सांवरिला घालोनि कर ॥ शक्राचे युद्धसमयीं पै ॥६५॥

ऐसें गांठीस असतां शस्त्र ॥ तुज भय नाहीं अणुमात्र ॥ राज्यीं स्थापून तुझा पुत्र ॥ रामचंद्र वना धाडीं ॥६६॥

मनुसंख्या संवत्सर ॥ वनासी धाडीं रघुवीर ॥ चतुर्दश वर्षात तुझा पुत्र ॥ चवदा भुवनें जिंकील पैं ॥६७॥

वना निघतां रामचंद्र ॥ समागमें जाईल सौमित्र ॥ काननीं राक्षस परम दुर्धर ॥ रामलक्ष्मणां भक्षितील ॥६८॥

राक्षसें भक्षिल्या रघुनंदन ॥ भरतासी सहजचि कल्याण ॥ यालागीं वर दोनी घे मागून ॥ रायापाशीं आतांचि ॥६९॥

वनासी निघतां रघुनाथ ॥ प्राण त्यागील दशरथ ॥ तेहि गोष्टीचें तुजला हित ॥ राज्यीं भरत स्थापावया ॥१७०॥

रामाचे आवडते भक्त ॥ तेहि बाहेर घालूं समस्त ॥ आतां येईल दशरथ ॥ करीं अनर्थ येथेंचि ॥७१॥

ऐसीं ते दासीचीं वचनें ॥ हृदयीं धरिलीं कैकयीनें ॥ जैसें वमन होतांचि श्र्वानें ॥ उचलोनियां घेइंजे ॥७२॥

कीं शिंदीवृक्षापासून ॥ किंचित निघतां मद्यजीवन ॥ मद्यपी जैसा वोढवी वदन ॥ तैसेंचि वचन मानलें ॥७३॥

मर्कटासी मदिरारस पाजिला ॥ त्यांत वृश्र्चिकें दंश केला ॥ त्यामाजीं भूतसंचार झाला कैकयीस जाहलें तैसेंचि ॥७४॥

अलंकार काढिले झडकरीं ॥ तोडून टाकिली गळसरी ॥ केशमुक्त उर्वीवरी ॥ निद्रा करी सक्रोधें ॥७५॥

तंव ते भोगसमयाची वेळ ॥ कैकयीगृहा आला भूपाळ ॥ राजा मंथरेसि पुसे उतावेळ ॥ राीण आमुची कोठें पैं ॥७६॥

तंव ते बोले पापखाणी ॥ पैल ते पडली तुमची राणी ॥ काय आहे तिचे मनीं ॥ तें तो न कळेचि आम्हांतें ॥७७॥

मग कैकयीजवळी येऊन ॥ करें कुरवाळी राजा वदन ॥ दिधलें दशरथासी लोटून ॥ झिडकारून एकीकडे ॥७८॥

म्हणे परता होईं नृपा नष्टा ॥ असत्यवादिया क्रियाभ्रष्टा ॥ तुझे अंतरींचा भाव खोटा ॥ सर्वही म्यां ओळखिला ॥७९॥

ऐसे शब्द ऐकतां तीव्र ॥ धगधगिलें रायाचें अंतर ॥ चरण तिचे धरी सत्वर ॥ येरी लोटी परतेंचि ॥१८०॥

राजा म्हणे संभ्रम होत ॥ राज्यीं स्थापितों रघुनाथ ॥ तूं विघ्न न करीं येथ ॥ शरणागत तुझा मी ॥८१॥

वस्त्रें भूषणें अलंकार ॥ अपेक्षित देईन समग्र ॥ तुझ्या वचनालागीं निर्धार ॥ प्राण वेंचीन जाणपां ॥८२॥

मी असतां गळसरी ॥ तोडून टाकिली महीवरी । मागुता जावोनि चरण धरी ॥ लोटी निजकरीं कैकयी ॥८३॥

स्त्रीलोभाचिये आवडी ॥ प्राणी नाडिले लक्षकोडी ॥ जन्म मरणांचिया ओढी ॥ माजी पडिले बहुतचि ॥८४॥

स्त्रीलोभ परम दारुण ॥ पूर्वीं नाडले बहुतजण ॥ मूर्तिमंत भव्यव्याधि कामिन ॥ भुलवि सज्ञान जाणते ॥८५॥

संसारअनर्थास मूळ ॥ तो स्त्रीसंबंध जाण केवळ ॥ स्त्रीलोभें पापें सकळ ॥ आंगीं येऊन झगटती ॥८६॥

असो तो राजा दशरथ ॥ स्त्रीलोभें जाहला भ्रांत ॥ कैकयीस म्हणे माग इच्छित ॥ तें मी यथार्थ पुरवीन ॥८७॥

कैकयीस संकेत दावी मंथरा ॥ सांडूं नको पूर्वील निर्धारा ॥ मागून घेईं दोहीं वरां ॥ वना रघुवीरा पाठवीं ॥८८॥

कैकयी म्हणे नृपनायका ॥ माझ्या स्वर्गीच्या दोन्ही भाका ॥ न द्याल तरी उणें देखा ॥ येईल वंशा तूमच्या ॥८९॥

राजा म्हणे माग सत्वर ॥ तुज दीधले अपेक्षित वर ॥ मग म्हणे वना धाडीं रघुवीर ॥ राज्य भरतासी समर्पीं ॥१९०॥

जवळीं असतां रघुनायक ॥ त्याकडे होतील सकळ लोक ॥ यालागीं दूर वनासी देख ॥ आतांचि शीघ्र पाठवावें ॥९१॥

मनुसंख्यासंवत्सर ॥ राज्य करील माझा पुत्र ॥ मग तुम्ही आणावा रघुवीर ॥ अथवा तिकडेच ठेविजे ॥९२॥

ऐसें ऐकतांचि वचन ॥ गजबजलें रायाचें मन ॥ वाटे विद्यल्लता येऊन ॥ अंगावरी पडियेली ॥९३॥

कीं शरीर अग्नींत पडलें ॥ कीं काळिजीं कर्वत घातले ॥ कीं पर्वताचे कडे कोसळले ॥ आंगावरी अकस्मात ॥९४॥

कैकयीवचन प्रळयाग्न ॥ जाळीत चालिला आयुष्यकानन ॥ मग तिचे धांवोन धरी चरण ॥ पदर पसरून मागतसे ॥९५॥

जो जो मागसील पदार्थ ॥ तो तो पुरवीन समस्त ॥ परी सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९६॥

मी पृथ्वीपति राजा दशरथ ॥ परी तुझा असें शरणागत ॥ सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९७॥

पट्टराणिया समस्त ॥ तुझ्या सेवेसी लावीन यथार्थ ॥ परी सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९८॥

जो लावण्यामृतसागर ॥ उदार धीर गुणगंभीर ॥ कोमळगात्र रघुवीर ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९९॥

काय रघुत्तमें अन्याय केला ॥ एवढा त्यावरी कोप धरिला ॥ डोळस तमालनील सांवळा ॥ वनाप्रति धाडूं नको ॥२००॥

भरतापरीस रघुनंदन ॥ तुज प्रिय होता मनांतून ॥ आतां कां कठीण केलें मन ॥ मजलागून सांग तें ॥१॥

कैकयीपुढें पसरी पदर ॥ वना धाडूं नको शतपत्रनेत्र ॥ यरी म्हणे तूं अधम साचार ॥ माझीं वरदानें न देसी तूं ॥२॥

तुझे पुर्वज संपूर्ण ॥ भाकेकारणें वेंचिती प्राण ॥ त्यांचिये वंशीं जन्मोन ॥ डाग लाविला कुळासी ॥३॥

कैकयीशद्बवज्र कठिण ॥ रायाचें हृदय जाहलें चूर्ण ॥ भूमीवरी मूर्च्छा येऊन ॥ निचेष्टित पडियेला ॥४॥

इतुका रात्रीं वर्तला वृत्तांत ॥ तों प्रातःकाळीं आला सुमंत ॥ रायासी करून प्रणिपात ॥ वचन बोलता जाहला ॥५॥

सर्व साम्रगी जाहली पूर्ण ॥ वाट पाहत ब्रह्मनंदन ॥ अरुणोदय जाहला चंडकिरण ॥ उदय करूं पाहतो ॥६॥

तरी तुम्हीं येऊनियां तेथ ॥ राज्यीं स्थापावा रघुनाथ ॥ वचन न बोलतां दशरथ ॥ चकित सुमंत विलोकी ॥७॥

मनीं विचारी अजसुत ॥ ही मात ऐकतां रघुनाथ ॥ वनास जाईल यथार्थ ॥ थोर अनर्थ ओढवला ॥८॥

कैकयी म्हणे सुमंता ॥ येथवरी आणीं रघुनाथा ॥ मी त्यांसी सांगेन अवघी वार्ता ॥ जे जाहली कथा पूर्वींची ॥९॥

रायास निद्रा लागली जाण ॥ यालागीं न बोलेचि वचन ॥ तो इकडे ब्रह्मपुत्रें संपूर्ण ॥ सामग्री सिद्ध केली असे ॥२१०॥

सुमंत म्हणे कैकयीलागून ॥ रायें भूमीवरी कां केलें शयन ॥ तों दशरथे स्फुंदस्फुंदोन ॥ रुदन करूं लागला ॥११॥

म्हणे सुमंता ऐक वचन ॥ माण् जवळी आलें मरण ॥ येथवरी आणी रघुनंदन ॥ कोणासी वर्तमान न सांगावें ॥१२॥

सुमंत आज्ञा वंदून ॥ निघाला तेव्हां म्लानवदन ॥ जैसा सूर्य ग्रहणीं कलाहीन ॥ तैसे आनन दिसतसे ॥१३॥

विचार करी सुमंत ॥ रामधामाकडे जात ॥ जैसा मुमुक्षु संसारतापें संतप्त ॥ वेगें येत संतसदना ॥१४॥

केवळ आत्मप्राप्तीचें स्थान ॥ तैसें दिसे रामसदन ॥ चारी महाद्वारें ओलांडून ॥ जाता जाहला तेधवा ॥१५॥

दृष्टी पाहावया रघुवीर ॥ क्रमोनि गेला स्थूळदेहद्वार ॥ दुसरें सूक्ष्म सुंदर ॥ तत्त्वांसहित ओलांडिलें ॥१६॥

पुढें क्रमोनियां कारण ॥ वेगें निघाला प्रधान ॥ तों महाकारण दैदीप्यमान ॥ चौथें द्वार देखिलें ॥१७॥

चतुर्थ द्वारींची पाहतां रचना ॥ ब्रह्मानंद जाहला मना ॥ तुर्येचा उंबरा ओलांडूनि जाणा ॥ पुढें सत्वर जातसे ॥१८॥

तों मणिमय मंडपप्रभा घन ॥ त्यासी आठ पायऱ्या दैदीप्यमान ॥ श्रवण कीर्तन स्मरण ॥ पादसेवन तें चौथें ॥१९॥

अर्चन वंदन दास्य सख्य ॥ चढे सत्वर प्रधान देख ॥ तों स्वानंदचौकीवरी सीतानायक ॥ प्रधानोत्तमें विलोकिला ॥२२०॥

मग नवविधा भक्ति आत्मनिवेदन ॥ सुमंतें केलें साष्टांग नमन ॥ तंव तो कमलपत्राक्ष सुहास्यवदन ॥ काय तेव्हां बोलिला ॥२१॥

सुमंता तूं मुख्य प्रधान ॥ आम्हांस ज्येष्ठबंधूसमान ॥ तुझे निर्मळ गुण पाहोन ॥ ब्रह्मानंद मज वाटे ॥२२॥

मग तो जोडूनि दोन्ही कर ॥ उभा राहे राघवासमोर ॥ सांगे दशरथें सत्वर ॥ कैकयीसदनीं बोलाविलें ॥२३॥

आतां कैकयीसदना श्रीराम ॥ कैसा जाईल पूर्णब्रह्म ॥ तें कथाकौतुक सप्रेम ॥ संत सज्जन ऐकोत पां ॥२४॥

श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ भक्तिज्ञानवैराग्यभांडार ॥ दृष्टांत रत्नेंअपार ॥ माजी सतेज झगमगती ॥२५॥

ब्रह्मानंदा श्रीधरवरा ॥ श्रीमद्भीमातटविहारा ॥ पुराणपुरुषा निर्विकारा ॥ जगद्वंद्या अभंगा ॥२६॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार । सदा परिसोत पंडित चतुर ॥ नवमाध्याय गोड हा ॥२२७॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु

श्रीरामविजयअध्याय १० वा

श्री गणेशाय नमः॥

श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः

संतसज्जनांची मांदी मिळाली ॥ देखोनि वाग्देवी धांविन्नली ॥ शब्दरत्नांची भरणीं भरलीं ॥ वेगें आणिली भक्तिपेठे ॥१॥

पाहोनि ग्राहकांची आवडी ॥ परीक्षक तैसेंचि रत्न काढी ॥ कीं सुगरणीं जैसी वाढी ॥ अपेक्षा पाहूनि क्षुधितांची ॥२॥गात्रें पाहूनि भूषणें ॥ लेवविती पैं शाहाणे ॥ कीं दिनमान पाहून उष्णकिरणें ॥ दया जैसें पाविजे ॥३॥

कीं पाहूनियां समयघटिका ॥ उदय होय जेंवि शशांका ॥ कीं वर्षाकाळींचे देखा ॥ मेघ जैसे वर्षती ॥४॥

कीं ऋतुकाळीं येती फळें ॥ कीं उत्तम काळ पाहूनि भले ॥ सत्कर्में करिती सकळें ॥ निष्कामबुद्धीकरूनियां ॥५॥

कीं वेदांचें अंतर पाहूनि देख ॥ चालताति शास्त्रांचे तर्क ॥ कीं लवण पाहूनि उदक ॥ धांवे जैसें त्वरेनें ॥६॥

तैसें श्रोत्यांचें जाणोनि अंतर ॥ रामकथा आरंभिली साचार ॥ बोलिला वाल्मीक ऋषीश्र्वर ॥ तेंचि चरित्र परिसा पां ॥७॥

शब्दभवाब्धि भरला अपार ॥ कवितालक्ष तारूं थोर ॥ स्फुर्तिवायूच्या बळें सत्वर ॥ जहाज चाले त्वरेनें ॥८

सद्गुरुकृपा हेंचि बंदर ॥ तेथें शब्दरत्नें भरलीं अपार ॥ संतपेठेसी आणिलीं साचार ॥ ग्राहक थोर म्हणोनियां ॥९॥

तरी सादरता देऊनि धन ॥ घ्या जी शब्दरत्नें परीक्षा करून ॥ असो पूर्वोध्यायीं सुमंत प्रधान ॥ श्रीरामगृहासी पातला ॥१०॥

शोकाकुलित होऊनि ॥ दशरथ पडला कैकयीसदनीं ॥ अग्निसंगेकरूनि ॥ मुक्त जैसें आहाळलें ॥११॥

ग्रहणकाळीं सूर्यचंद्र ॥ दिसती कळाहीन साचार ॥ कीं पंकगर्तेत सुकुमार ॥ हंस जैसा रुतला ॥१२॥

तैसा जाण द्विपंचरथ ॥ पडिला असे शोकग्रस्त ॥ सुमंत पाठविला त्वरित ॥ श्रीरामासी आणावया ॥१३॥

असो सुमंत म्हणे जी श्रीरामा ॥ रायें बोलाविलें कैकयीधामा ॥ पुराणपुरुष सर्वात्मा ॥ तात्काळ उठोनि चालिला ॥१४॥

रथीं बैसला ते क्षणीं ॥ नवमेघरंग चापपाणी ॥ भक्तकैवारी कैवल्यदानी ॥ वेदपुराणीं वंद्य जो ॥१५॥

वस्त्रालंकारमंडित पूर्ण ॥ पाहती सर्व अयोध्याजन ॥ म्हणती कोट्यानकोटी मीनकेतन ॥ श्रीरामावरूनि ओंवाळिजे ॥१६॥

श्रीराममुकुटींची दिव्य कळा ॥ तेणें रविमंडप उजळला ॥ त्या तेजांत सूर्य बुचकळला ॥ प्रकाश पडला पृथ्वीवरी ॥१७॥

मकराकार शोभती कुंडलें ॥ कीं प्रळयाग्नीनें नेत्र उघडिले ॥ कीं कल्पांतविजूचे उमाळे ॥ शीतळ जाहले सर्वही ॥१८॥

अनंत बाळसूर्याच्या कळा ॥ श्रीरामरूपीं लोपल्या सकळा ॥ कीं ब्रह्मानंद रस ओतिला ॥ सगुणलीला धरूनियां ॥१९॥

सुवर्णोदकनदी निर्मळ ॥ मेरुपाठारीं वाहे सदा काळ ॥ तैसें केशरदिव्यतिलक भाल ॥ श्रीरामाचें शोभतसे ॥२०॥

अंगी दिव्य चंदन चर्चित ॥ अयोध्येमाजी सुवास बहंकत ॥ तेणें घ्राणदेवता नाचत ॥ निजानंदें करूनियां ॥२१॥

गुणीं ओविलीं भगणें सकळें ॥ तैसे मुक्ता हार शोभती चांगले ॥ अनंत ब्रह्मांडें एकेचि वेळे ॥ एकसरें डोलती ॥२२॥

अपार राहिले भक्त प्रेमळ ॥ म्हणोनि रुंदावलें वक्षःस्थळ ॥ दिव्य तेज पदक निर्मळ ॥ प्रभेनें निराळ कोंदलें ॥२३॥

अजानुबाहु रघुनंदन ॥ करीं विराजत चापबाण ॥ कटीं मेखळा पीतवसन ॥ चपळेहून झळकतसे ॥२४॥

असो ऐसा रघुनाथ ॥ रथारूढ विरिंचितात ॥ छप्पन्न देशींचे राजे समस्त ॥ देखोनियां आनंदले ॥२५॥

पुढें चालत चतुरंग दळ ॥ धडकत वाद्यांचा कल्लोळ ॥ श्रीराम पाहावया सकळ ॥ उतावीळ जन जाहले ॥२६॥

पाहतां श्रीरामाचें मुखकमळ ॥ राजे आनंदले सकळ ॥ म्हणती जन्म जाहला सुफळ ॥ तमालनीळ देखिला ॥२७॥

धन्य धन्य तो दशरथ ॥ जयाच्या उदरीं अवतरला रघुनाथ ॥ यासी राज्यपद यथार्थ ॥ देईल आतां संभ्रमें ॥२८॥

तो सोहळा पाहूनि नयनां ॥ जाऊं आपुल्या स्वस्थाना ॥ असो ऐसा मिरवत रामराणा ॥ कैकयीसदनासमीप आला ॥२९॥

जवळी आला ऐकोनि रघुनाथ ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे दशरथ ॥ लोकां बाहेर टाकोनि जात ॥ श्रीराम दशरथाजवळी पैं ॥३०॥

लक्ष्मण आणि सुमंत ॥ यांसहित प्रवेशे रघुनाथ ॥ तों मुर्च्छित पडला दशरथ ॥ नयनीं वाहत अश्रुधारा ॥३१॥

रामें दशरथासी केलें नमन ॥ वंदिलें कैकयीचे चरण ॥ येरी म्हणे विजयी पूर्ण ॥ सर्वदाही होसी तूं ॥३२॥

श्रीराम पुसे कैकयीसी ॥ काय व्यथा रायाचे मानसी ॥ कां शयन केलें भूमीसी ॥ मजप्रति सांगिजे ॥३३॥

कैकयी सांगे समाचार ॥ रायें मज दिधले दोन वर ॥ ते मी मागतां साचार ॥ दुःख थोर वाटलें ॥३४॥

मग बोले रघुनंदन ॥ ते मी भाक पुरवीन ॥ येरी म्हणे तूं वनासी करीं गमन ॥ चतुर्दश वर्षें पर्यंत ॥३५॥

सांगातें नेईं सुमित्रासुत ॥ राज्य करील माझा भरत ॥ तूं वनीं होसील यशवंत ॥ सीताकांत अवश्य म्हणे ॥३६॥

मातेची आज्ञा सर्वथा ॥ न मोडावी प्रमाण शास्त्रार्था ॥ संन्यास जरी घेतला तरी माता ॥ वंदावी हें साचार ॥३७॥

प्राणाहून पलीकडे ॥ माझा भरत मज आवडे ॥ त्यास राज्य देतां मत सांकडें ॥ सर्वथाही वाटेना ॥३८॥

भूधर अवतरला लक्ष्मण ॥ परम क्रोधावला जाण ॥ भ्रकुटीये आंठी घालोन ॥ नेत्रयुगुल वटारिलें ॥३९॥

जैसा विवेकबळेंकरून ॥ क्रोध आवरिती साधकजन ॥ तैसाचि उगा राहिला लक्ष्मण ॥ भीड धरून रामाची ॥४०॥

असो कैकयीस नमून रामराणा ॥ आला कौसल्येच्या सदना ॥ परमानंद पावला मना ॥ तपोवना जावया ॥४१॥

कीं दैत्य वधावया जातां स्वानंद ॥ गजवदन आणि वीर स्कंद ॥ नमिलें अन्नपूर्णेचें चरणारविंद ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥४२॥

कीं करूं जातां अमृतहरण ॥ सुपर्णे वंदिले जननीचरण । त्याजपरी रघुनंदन ॥ कौसल्येसी नमीतसे ॥४३॥

सांगीतलें सकळ वर्तमान ॥ धगधगिलें कौसल्येचें मन ॥ भूमीसी पडली मूर्च्छा येऊन ॥ वाटे प्राण चालिला ॥४४॥

किंवा हृदयीं शस्त्र खोंचलें ॥ कीं लोभियाचें धन हरविलें ॥ तैसे कौसल्येसी वाटलें ॥ आज्ञा मागतां श्रीरामें ॥४५॥

मग म्हणे घनश्यामगात्रा ॥ रामा माझ्या राजीवनेत्रा ॥ मज सांडोनि पवित्रा ॥ कैसा वना जाशील ॥४६॥

माझे पुष्पवाटिकेआंत ॥ राहें चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ कोणासी तूं न भेटें यथार्थ ॥ राहें गुप्त राघवा ॥४७॥

श्रीराम म्हणे माते ॥ तैसें नव्हे जाणें वनातें ॥ सत्य करावया पितृवचनातें ॥ दंडकारण्या जाईन मी ॥४८॥

पश्र्चिमेस उगवेल चंडकिरण ॥ परी मी न मोडीं पितृवचन ॥ होईन भाकेसी उत्तीर्ण ॥ नसे अनमान सर्वथा ॥४९॥

जन्मोनियां जनकपोटीं ॥ साच न करवे त्याची गोष्टी ॥ तरी अपकीर्तीनें सृष्टी ॥। भरोनियां उचंबळे ॥५०॥

साच न करवे पितृवचन ॥ व्यर्थ काय जन्मास येऊन ॥ विगतधवेचें सुंदरपण ॥ किंवा ज्ञान दांभिकाचें ॥५१॥

कीं वोडंबरीचें शूरत्व जाण ॥ कीं अजाकंठींचें जैसे स्तन ॥ कीं नटामाजील कामिन ॥ कीं कंटकवन सधन पैं ॥५२॥

कीं जन्मांधाचे विशाळ नेत्र ॥ कीं मद्यपियाचें अपवित्र पात्र ॥ कीं अदात्याचें उंच मंदिर ॥ व्यर्थ काय जाळावें ॥५३॥

यालागीं पुत्र तोचि धन्य ॥ जो साच करी पितृवचन ॥ तरी मज वना जावयालागून ॥ आज्ञा देईं अंबे तूं ॥५४॥

म्हणोनि श्रीरामें धरिले चरण ॥ उभा राहिला कर जोडून ॥ धबधबां वक्षःस्थळ बडवून ॥ कौसल्येनें घेतलें ॥५५॥

नगरीं जेव्हां फुटली मात ॥ कीं वना जातो श्रीरघुनाथ ॥ वर्तला एकचि आकांत ॥ पडिले मूर्छित लोक तेव्हां ॥५६॥

कौसल्या म्हणे रघुनंदना ॥ सुकुमारा जगन्मोहना ॥ माझी मोडोनियां आज्ञा ॥ कैसा वना जातोसी ॥५७॥

श्रीरामासी म्हणे लक्ष्मण ॥ मज आज्ञा देईं अणुप्रमाण ॥ कैकयीचें शिर छेदून ॥ संतोषवीन सकळांसी ॥५८॥

रघुपति तूं वना जातां व्यर्थ ॥ प्राण त्याजील दशरथ ॥ राज्य बुडेल समस्त ॥ अयोध्या ओस होईल ॥५९॥

परम प्रेमळ बंधु भरत ॥ तो राज्य न करील यथार्थ ॥ इचा वध करितां सत्य ॥ तोही सुख पावेल ॥६०॥

सकळ अनर्थांचें कारण ॥ कैकयी असत्याचें भाजन ॥ इजला टाकितां वधून ॥ सकळ जन आनंदती ॥६१॥

जैसी समूळ टाकितां दुर्वासना ॥ साधक पावती आत्मसदना ॥ कीं रजनी सरतां सकळ जनां ॥ सूर्योदयीं आनंद ॥६२॥

मग बोले श्रीराम ॥ प्राणांत जाहलिया विपरीत कर्म ॥ सहसा न करावें हें वर्म ॥ हृदयीं धरीं लक्ष्मणा ॥६३॥

कौसल्या सुमित्रा जैशा माता ॥ तैशीच कैकयी जाण तत्वतां ॥ तियेचा वध करितां ॥ मग यश कैचें आम्हांतें ॥६४॥

लक्ष्मण म्हणे श्रीरामातें ॥ तरी मज न्यावें सांगातें ॥ नाहीं तरी प्राण त्यागीन येथें ॥ मग तूं वना सुखें जाय ॥६५॥

तों सुमित्रा म्हणे रघुनंदना ॥ माझा लक्ष्मण नेईं वना ॥ सेवील तुझिया निजचरणां ॥ प्रेमभावेंकरूनियां ॥६६॥

रामा तुजवेगळा एक क्षण ॥ सर्वथा न राहे लक्ष्मण ॥ वनीं फळें जीवन आणून ॥ शय्येसी तृण निजावया ॥६७॥

तुझी सेवा करील परिकर ॥ तेणें आनंद मज थोर ॥ ऐसें बोलतां सुमित्रेचें नेत्र । प्रेमोदकें भरून आले ॥६८॥

मग उर्मिलेचें समाधान ॥ करूनियां लक्ष्मण ॥ सिद्ध जाहला प्रयाण ॥ वनाप्रति करावया ॥६९॥

कौसल्या म्हणे रघुनंदना ॥ बारे मज टाकूनि जासी वना ॥ कांटे पाषाण तुझिया चरणां ॥ चालतां रज खुपतील ॥७०॥

जडितांबरें सर्व सांडोनि ॥ कैसा राहशील वल्कलें वेष्टुनि ॥ भ्रमरपर्यंक त्यजोनि ॥ भूमिशयनें केंवि करिशी ॥७१॥

त्यजूनि रत्नजडित कोटीर ॥ कैसा राखसी जटाभार ॥ रामा तुझी तनु सुकुमार ॥ वातउष्णें श्रमेल कीं ॥७२॥

सुगंध परिमळ त्यजूनि परम ॥ कैसें चर्चिसी भस्म ॥ वनीं राक्षस दुर्धर परम ॥ छळावया तुज येतील ॥७३॥

वनीं सांडपसी तूं जगजेठी ॥ म्ग तुझी कोण राखील पाठी ॥ शोकें कौसल्या हृदय पिटी ॥ म्हणे काय करूं आतां ॥७४॥

मग औषधी मोहरे अनेक आणुनी ॥ रामाचे दंडीं बांधीं जननी ॥ रामासी पाणी लागेल वनीं ॥ औषधीमणी कबरीं बांधी ॥७५॥

वनीं दृष्टावेल रघुनाथ ॥ म्हणोनि मोहरे करीं बांधित ॥ कांही एक पीडा न होय यथार्थ ॥ ऐशा वस्तु देत माता ॥७६॥

ते आदिपुरुषाची जननी ॥ वनसी निघतां चापपाणी ॥ पंचभूतांसी कर जोडोनी ॥ प्रार्थना करी भावार्थें ॥७७॥

धरणीस कौसल्या विनवीत ॥ माते तुझा श्रीराम जामात ॥ यासी रक्षीं यथार्थ ॥ निजस्नेहेंकरूनियां ॥७८॥

ज्या पंथें जाईल कमलपत्राक्ष ॥ रक्षो यासी सर्वदा ॥७९॥

रातोत्पलें कमलें पूर्ण ॥ त्यांहून सुकुमार रामचरण ॥ त्याचिया चरणीं खडे पाषाण ॥ रुतों नेदीं अवनीये ॥८०॥

उदकासी कौसल्या म्हणत ॥ रघुवीर होईल तृषाक्रांत ॥ नदी सरोवरें समस्त ॥ पूर्णोदकें ठेवीं कां ॥८१॥

म्हणे विश्र्वप्रकाश चंडकिरणा ॥ तूं रक्षीं आपले कुलभूषणा ॥ तुझीं किरणें मनमोहना ॥ स्पर्शो नेदीं सर्वथा ॥८२॥

लोकप्राणेशा प्रभंजना ॥ लघु माझिया रघुनंदना ॥ तुझिया गुणें धुळी नयनां ॥ माजी न जावी सर्वथा ॥८३॥

उष्णें शिणतां रघुनाथ ॥ तूं मंद मंद येई मारुत ॥ जेणें सुखावे अवनिजाकांत ॥ करीं ऐसें प्राणेशा ॥८४॥

अंबरा तूं निर्विकार पाहीं ॥ शब्दविषय तुझे ठायीं ॥ मंजुळ शब्द तुझे हृदयीं ॥ अंडज करोत सर्वदा ॥८५॥

ब्रह्मा शिव इंदिरावर ॥ अष्ट दिक्पाल एकादश रुद्र ॥ नव ग्रह वसु द्वादश मित्र ॥ माझा रघुवीर रक्षोत ॥८६॥

देव उपदेव कर्मज देव ॥ पाताळभोगी सर्प मानव ॥ जलचर जलार्णव ॥ माझा रघुवीर रक्षावा ॥८७॥

चराचर प्राणी जे वहिले ॥ चहूं खाणींमाजीं जन्मले ॥ वेदशास्त्रें पुराणें सकळें ॥ ब्रह्म सांवळे रक्षोत ॥८८॥

कर जोडोनि कौसल्या सती ॥ चराचर जीवांसी प्रार्थिती ॥ परी हा आदिपुरुष रघुपति ॥ नेणवेचि तियेतें ॥८९॥

जो दानवकुळवैश्र्वानर ॥ साधुहृत्प्रमच्छेदक दिवाकर ॥ नेणें साचार कौसल्या ॥९०॥

जो अरिचक्रावारणपंचानन ॥ कीं दुःख पर्वतभंजन सहस्रकिरण ॥ कीं विघ्नफणिपाळ विदारून ॥ त्यावरून ॥ त्यावरी सुपर्ण रघुवीर ॥९१॥

तो सज्जनचकोरामृतकर ॥ भक्तचातकसजलजलधर ॥ कीं साधुनयनाब्जमित्र ॥ तो हा साचार अवतरला ॥९२॥

असो याउपरी कौसल्या म्हणत ॥ चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ व्यर्थ देह हा प्रेतवत ॥ कैसा पाळूं मी आतां ॥९३॥

कैसें पूर्वकर्म गहन ॥ फळा आलें मुळींहून ॥ अमलदलराजीवनयन ॥ वनास जातो ये वेळे ॥९४॥

तूं वना जातोसी रघुनंदना ॥ स्तनीं दाटला प्रेमपान्हा ॥ माझ्या विसाविया मनमोहना ॥ गुणनिधाना जाऊं नको ॥९५॥

श्रीरामा भुवनसुंदरा ॥ डोळसा सुकुमारा राजीवनेत्रा ॥ मुनिजनरंजना गुणसमुद्रा ॥ जाऊं नको वनातें ॥९६॥

हृदयीं नसतां रघुनंदन ॥ संपत्ती त्या विपत्ती जाण ॥ कळा त्या विकळा संपूर्ण ॥ विद्या होत अविद्या ॥९७॥

श्रीरामाविण करिती कर्म ॥ तोच तयांस पडला भ्रम ॥ सच्चिदानंद मेघश्याम ॥ मज टाकूनि जातो कीं ॥९८॥

तंव देववाणी गर्जिन्नली पाहीं ॥ सर्वांठायीं राम विजयी ॥ कल्पांतीं तयासी भय नाहीं ॥ हा शेषशायी अवतरला ॥९९॥

जैसा जीव जातां वैद्य येऊन ॥ म्हणे मी तुज वांचवीन ॥ तैसे मायेस वाटलें पूर्ण ॥ आकाशवाणी ऐकतां ॥१००॥

आदिपुरुष निर्विकार ॥ कौसल्येस घाली नमस्कार ॥ प्रदक्षिणा करूनि वारंवार ॥ मुख विलोकीं जननीचें ॥१॥

जो मायातीत अगोचर ॥ तेणें आसुवें भरले नेत्र ॥ विमलांबुधारा पवित्र ॥ मुखावरून उतरल्या ॥२॥

मायेनें धांवून तयेवेळीं ॥ रामाचे गळां मिठी घातली ॥ तो शोक ऐकतां उर्वीमंडळीं ॥ कवींसी बोली न वर्णवे ॥३॥

म्हणे कमलपत्राक्षा रघुनंदना ॥ तुवां कैकयीची पाळिली आज्ञा ॥ मान दीधला पितृवचना ॥ माझी अवज्ञा कां करिसी ॥४॥

मग तो जगद्वंद्य रघुनायक ॥ मातेसी म्हणे न करीं शोक ॥ मी सत्वर परतोनि देख ॥ जननी येतों तुजपाशीं ॥५॥

असो सीतेचिया मंदिरांत ॥ प्रवेशला जनकजामात ॥ सीता जाहल आनंदभरित ॥ मूद ओंवाळी वरूनिय ॥६॥

मनीं जगन्माता विचारति ॥ कां एकलेचि आले श्रीरघुनाथ ॥ संगें राजचिन्हें नाहींत ॥ चिंताक्रांत जानकी ॥७॥

वृत्तांत सांगें रघुनंदन ॥ आम्ही वनाप्रति करितों गमन ॥ तुवां कौसल्येची सेवा करून ॥ सुखें राहावें येथेंचि ॥८॥

सुमित्रा आणि कैकयी ॥ समान भजें सर्वांठायीं ॥ जनकगृहा न जाय कदाही ॥ कुरंगनेत्रे जानकी ॥९॥

वनासी येसी तरी बहुत ॥ दंडकारण्य कठिण पंथ ॥ वात ऊष्ण शीत यथार्थ ॥ न सोसवे तुझेनि ॥११०॥

तंव ते सुंदर श़ृंगारमराळी ॥ गुणसरिता जनकबाळी ॥ सुकुमार राजस चंपककळी ॥ काय बोले तेधवां ॥११॥

अहा जगद्वंद्या श्रीरामा ॥ निजभक्तकामकल्पद्रुमा ॥ गजास्यजनकविश्रामा ॥ टाकुनि मला नव जावें ॥१२॥

जगज्जनका रघुवीरा ॥ जनकजामाता जगदुद्धारा जगरक्षका जलनेत्रा ॥ जलदगात्रा रघुराजा ॥१३॥

जलचरें जल सांडून ॥ वेगळीं होतां त्यजिती प्राण ॥ द्विजकुळांसी आकाशावांचून ॥ नव्हे भ्रमण कोठेंही ॥१४॥

दीप सांडूनि निश्र्चितीं ॥ प्रभा न राहे कल्पांतीं ॥ कनकासी टाकूनि कांति ॥ कदा परती नव्हेचि ॥१५॥

शिवावेगळी नाहे अंबिका ॥ किरणें न सोडिती कदा अर्का ॥ साधुहृदय सांडोनि सद्विवेका ॥ कोठें जाणें घडेना ॥१६॥

रत्नावेगळी कळा ॥ गोडी न सोडी गुळा ॥ कस्तूरी न सोडी परिमळा ॥ तेवीं मी वेगळी नव्हेचि ॥१७॥

म्हणोनि रघुपति कोमलांगा ॥ दयाळा मम हृदयाब्जभृंगा ॥ ताटिकांतका नवमेघरंगा ॥ मज टाकूनि न जावें ॥१८॥

सिंह सखा असतां पाहीं ॥ मग कांतारीं हिंडतां भय नाहीं ॥ सीतेचे शब्द ऐकतां हृदयीं ॥ जगदात्मा संतोषला ॥१९॥

जानकीवचन सुधाकर ॥ तेणें तोषले रामकर्णचकोर ॥ कीं वचनमेघ गर्जतां गंभीर ॥ मनमयूर नृत्य करी ॥१२०॥

रघुपती म्हणे इंदुवदने ॥ श्रीवसिष्ठाचे चरण धरणें ॥ मज वनाप्रति पाठवणें ॥ हेंचि विनवीं तयांप्रति ॥२१॥

तुज नेतां वनाप्रति ॥ नानाशद्बें लोक निंदिती ॥ यालागी पुसोनि वनाप्रति ॥ समागमें निघावें ॥२२॥

मग वसिष्ठाचिये चरणीं ॥ नमन करी जगज्जननी ॥ म्हणे मी राघवाची सांगातिणी ॥ वनवासीं होईन ॥२३॥

मग वसिष्ठ म्हणे रघुनाथा ॥ संगे नेईं जनकदुहिता ॥ सवें असो द्यावें सुमित्रासुता ॥ रक्षणार्थ तुम्हांतें ॥२४॥

असो सौमित्रास म्हणे राघवेश ॥ वसिष्ठगृहीं आहे मम धनुष्य ॥ अक्षय भाते निःशेष ॥ वरद शस्त्रें आणावीं ॥२५॥

आपुलें संग्रहधन रघुवीर ॥ याचका वाटी उदार ॥ गुरुगृहास द्रव्य अपार ॥ वस्त्रें भूषणें धाडिलीं ॥२६॥

आणि नाना वस्तु संपत्ति ॥ पाठविल्या गुरुगृहाप्रति ॥ सद्रुरूसी जे न भजती ॥ अभागी निश्र्चिती तेचि पैं ॥२७॥

तनुमनधनेंसी शरण ॥ श्रीगुरुसी जो न जाय आपण ॥ तो जाहला जरी शास्त्रप्रवीण ॥ न करितां गुरुभजन तरेना ॥२८॥

व्यर्थ गेलें तयाचें तप ॥ जळो जळो तयाचा जप ॥ व्थर्थ काय कोरडा प्रताप ॥ गुरुवचन नावडे जया ॥२९॥

सद्रुरूचे घरीं आपदा ॥ आपण भोगी सर्व संपदा ॥ त्या अपवित्राचें मुख कदा ॥ दृष्टीं न पहावें कल्पांतीं ॥१३०॥

तरी तैसा नव्हे रघुवीर ॥ गुरुगृहाप्रति अपार ॥ द्रव्य वस्त्रें अलंकार ॥ पाठविलीं तेधवां ॥३१॥

गुरुपुत्र परम सूज्ञ ॥ आदरें आणिला बोलावून ॥ आपलीं वस्त्रें भूषणें काढून ॥ तया संपूर्ण लेवविलीं ॥३२॥

सीतेनें वस्त्रें भूषणें अपार ॥ सुयज्ञासी दिधलीं सत्वर ॥ रथ देऊनियां गुरुपुत्र ॥ निजगृहास पाठविला ॥३३॥

सकळ ऋषींच्या गृहाप्रति ॥ द्रव्य पाठवी रघुपति ॥ चौदा वर्षें निश्र्चितीं ॥ पुरोन उरे अपार ॥३४॥

विश्र्वामित्र असित कण्व ॥ दुर्वास भृगु वामदेव ॥ अंगिराआदि द्विज सर्व ॥ द्रव्य राघव पाठवी त्यांतें ॥३५॥

कौसल्या सुमित्रा माता जाणा ॥ द्रव्य पाठवी तयांच्या सदना ॥ रामें आपुले सेवकजनां ॥ द्रव्य अपार दिधलें ॥३६॥

दरिद्री दीन कुटुंबवत्सल ॥ अशक्त पंगु केवळ ॥ तयांसी द्रव्य तमानीळ ॥ आणूनि देता जाहला ॥३७॥

इष्ट अत्यंत गौरवून ॥ सर्वांस म्हणे रघुनंदन ॥ स्नेह न सांडावा मजवरून ॥ सुखें करून नांदा हो ॥३८॥

मग कैकयीच्या गृहास ॥ येता जाहला जगन्निवास ॥ ते वेळे अयोध्येच्या लोकांस ॥ कल्पांतचि वाटला ॥३९॥

अयोध्येच्या नरनारी ॥ अश्रु वाहती तयांच्या नेत्रीं ॥ गोब्रह्मणांचा कैवारी ॥ वना जातो म्हणोनियां ॥१४०॥

इकडे कैकयीच्या सदनांत ॥ रामें नमिला दशरथ ॥ प्रदक्षिणा करोनि विलोकित ॥ वदनारविंद पितयाचें ॥४१॥

दशरथ म्हणे रघुनंदना ॥ राजीवनयना जातोसी वना ॥ मी न ठेवीं आपुल्या प्राणा ॥ कुलभूषणा रघुवीरा ॥४२॥

राजा म्हणे श्रीरामातें ॥ दळभार नेईं सांगातें ॥ वनामाजी सुखें वर्तें ॥ चौदा वर्षेपर्यंत ॥४३॥

तों रामचंद्र बोले वचन ॥ मी तपालागीं सेवितां कानन ॥ तेथें दळभाराचें कारण ॥ सर्वथाही नसेचि ॥४४॥

वल्कलें वेष्टूनि वनांत ॥ तप करीन मी यथार्थ ॥ ऐसी कैकयीनें ऐकोनी मात ॥ वल्कलें पुढें ठेविलीं ॥४५॥

तीं वेष्टूनि श्रीराम ॥ श्यामलांगीं लाविलें भस्म ॥ केशभार सुवास परम ॥ आकर्षोनि बांधिले ॥४६॥

सौमित्रें वल्कलें वेष्टून ॥ वंदिले दशरथाचे चरण ॥ तों कैकयी म्हणे सीते झडकरून ॥ वस्त्रें भूषणें फडीं कां ॥४७॥

ऐसें ऐकतां जनकबाळी ॥ तडिदंबर भूषणें त्यागिलीं ॥ तीं सर्व कैकयीनें आवरिलीं ॥ वल्कलें दीधलीं नेसावया ॥४८॥

तंव वल्कलें कडकडीत कठिण ॥ नेसतां न येती सीतेलागून ॥ मग आपुले करें रघुनंदन नेसवीत जानकीतें ॥४९॥

जानकी सुकुमार अत्यंत ॥ वल्कलें नेसतां अंगास रुपत ॥ ते देखोनि ब्रह्मसुत ॥ निर्भस्ति कैकयीतें ॥१५०॥

परम निर्दय तूं पापिणी ॥ घेसी सीतेचीं वस्त्रें हिरोनी ॥ तूं जाहलीस राज्यबुडवणी ॥ रामासी वनीं धाडिसी ॥५१॥

दशरथ म्हणे ते अवसरीं ॥ गृहांतूनि नीघ जा बाहेरी ॥ तीं विकावया मांडोनि बाजारीं ॥ धगडी बैस आतांचि ॥५२॥

माझीं बाळें सुकुमार ॥ निर्दये घालिसी बाहेर ॥ मी भाकें बांधिलों साचार ॥ नाहीं तरी शिर छेदितों ॥५३॥

आडांत पडला मृगेंद्र ॥ कीं सांपळ्यांत गोंविला व्याघ्र ॥ कीं वणव्यांत सांपडला फणिवर ॥ तैसा साचार गुंतलों मी ॥५४॥

कीं गळीं सांपडला मीन ॥ कीं पराधियें कोंडिलें हरिण ॥ कीं तस्करें वाटेसीं सज्जन ॥ गोंवोनि हरिले सर्वस्वें ॥५५॥

ऐसें बोलतां नृपवर ॥ हृदयीं दाटला गहिंवर ॥ पोटासी धरून सीता सुंदर ॥ म्हणे बाळे शिणलीस ॥५६॥

सुकुमार तूं चंपककळी ॥ वातउष्णें शिणवील वेल्हाळी ॥ गुणसरिते जनकबाळी ॥ सांगसी शीण कोणातें ॥५७॥

सुमंता सांगे राजेंद्र ॥ आणा दिव्य अलंकार ॥ सीतेसी देऊनि सत्वर ॥ जगन्माता गौरवीं ॥५८॥

त्यावरी ते मंगलभगिनी ॥ मस्तक ठेवी श्र्वशुरचरणीं ॥ वसिष्ठ नमिला स्नेहेंकरूनी ॥ म्हणे कृपा बहुत असों द्या ॥५९॥

जैसा द्वितीयेचा चंद्र ॥ दिवसेंदिवस होय थोर ॥ तैसा स्वामी स्नेहादर ॥ अपार वर्धमान होऊं दे ॥१६०॥

वसिष्ठ देत आर्शीर्वचन ॥ जोंवरी मृगांक चंडकिरण ॥ तोंवरी चिंरंजीव दोघेजण ॥ अक्षयी राज्य करावें ॥६१॥

असो वसिष्ठ आणि दशरथ ॥ रामलक्ष्मण निघतां त्वरित ॥ सव्य घालूनि हात जोडित ॥ काननामाजी जावया ॥६२॥

मुनी म्हणे तूं पूर्ण सती ॥ त्रिभुवनीं वाढेल तुझी कीर्ति ॥ विजयी होईल रघुपति ॥ वनांतरीं जाऊनियां ॥६३॥

सप्तशत राजयुवती ॥ तया साष्टांग नमी रघुपती ॥ माते वाढवावी प्रीति ॥ श्रीकौसल्येसमान सर्वदा ॥६४॥

तों एकचि हाक जाहली ते वेळे ॥ सर्व माता पिटती वक्षःस्थळें ॥ एक मृत्तिका घेऊनि बळें ॥ मुखामाजी घालिती ॥६५॥

एक भूमीसीं आपटिती शिरें ॥ एक केश तोडिती निजरकरें ॥ एक हाक फोडिती एकसरें ॥ रामा राहें रे म्हणोनियां ॥६६॥

दशरथ म्हणे चापपाणी ॥ ग्रामांतून न जावें चरणीं ॥ जान्वीपर्यंत षड्गुणी ॥ माझा रथ नेईं कां ॥६७॥

अवश्य म्हणे रघुनाथ ॥ तत्काळ आणविला रथ ॥ कर जोडूनि सुमंत ॥ पुढें उभा ठाकला ॥६८॥

दशरथाचे चरणीं भाळ ॥ ठेवूनियां तमालनीळ ॥ निघाला तेव्हां तत्काळ ॥ जाहला कोल्हाळ एकचि ॥६९॥

सीता रथावरी घेऊन ॥ निघती वेगें रामलक्ष्मण ॥ तेव्हां वक्षःस्थळ बडवून ॥ दशरथरायें घेतलें ॥१७०॥

उठोनि राव दशरथ ॥ द्वाराबाहेरी धांवत ॥ लोकांस म्हणे रघुनाथ ॥ राहवा आतां लवकरी ॥७१॥

कोठें गेलें माझें पाडस ॥ कोणीकडे गेला माझा राजहंस ॥ भेटावया आणा डोळस ॥ मी वनास जाऊं नेदीं ॥७२॥

मी आपुली घालीन आण ॥ रथापुढें आडवा येऊन ॥ राघवापुढें पदर पसरून ॥ वनवासी गमन करूं नेदीं ॥७३॥

गोपुरावरी चढे दशरथ ॥ चाचरी जाय खालें पडत ॥ मागुतीं बिदोबिदीं धांवत ॥ दीन वदनें करूनियां ॥७४॥

लोकांसी पुसे दशरथ ॥ राम कोठें दावा त्वरित ॥ वाटेसी अडखळून पडत ॥ मस्तक पिटीत अवनीये ॥७५॥

लोकांसी म्हणे म्लानवदन ॥ अयोध्येसी लावारे अग्न ॥ माझा जाईल आतां प्राण ॥ दावा वदन रामाचें ॥७६॥

प्राणाविण जैसें प्रेत ॥ तैसें अयोध्यापूर दिसत ॥ तरी अग्नि लावूनि त्वरित ॥ मजसहित भस्म करा ॥७७॥

दाही दिशा दिसती उदास ॥ अयोध्या नगर जाहलें ओस ॥ राघव गेला वनवासास ॥ मुख लोकांस काय दावूं ॥७८॥

जाहलें माझें काळें वदन ॥ आतां माझा जड देह त्यागिन ॥ वायुवेगीं जाईन ॥ काननीं राम शोधावया ॥७९॥

लोकांसी म्हणे ते वेळां ॥ मज राघव दाखवा सांवळा ॥ स्त्रिया म्हणती वना गेला ॥ आज्ञा घेऊनि तुमची पैं ॥१८०॥

एक वदे वेशींत आहे रथ ॥ ऐकतां धांवे दशरथ ॥ तों दूर गेला जनकजामात ॥ ध्वजही परतून दिसेना ॥८१॥

तों आरडत कौसल्या धांवे ॥ वरतीं करूनियां बाहे ॥ म्हणे कोमलगंगा उभा राहें ॥ वदन तुझें पाहूं दे ॥८२॥

कैकयींभाक अमावास्या थोर ॥ माजी न दिसे रामचंद्र ॥ त्यावियोगें आम्ही चकोर ॥ चिताग्नींत पडलों कीं ॥८३॥

कीं कैकयीवर केतु जाण ॥ राम झांकिला चंडकिरण ॥ चतुर्दश वर्षीं मुक्तस्नान ॥ तोंवरी उपोषण पडियेलें ॥८४॥

राम माझा मेघ पूर्ण ॥ कैकयीवर दुष्ट प्रभंजन ॥ दूर गेला झडपोन ॥ जीवनाविण सुकलों आम्ही ॥८५॥

मज अंधाची काठी हिरून ॥ कोणें वनीं टाकिली नेऊन ॥ मज दरिद्रियाची गांठ पूर्ण ॥ कोणें निर्दयें सोडिली ॥८६॥

माझें दवडिलें निधान ॥ चिंतामणि दिधला भिरकावून ॥ माझा परिस नेऊन ॥ कोण्या निर्दयें भिरकाविला ॥८७॥

मज पान्हा दाटला स्तनीं ॥ माझें तान्हें दावा हो नयनीं ॥ माझा सुकुमार घोर वनीं ॥ भोजन मागेल कोणासीं ॥८८॥

गेला वल्कलें वेष्टून ॥ कैचें तया मंगलस्नान ॥ रातोत्पलाहून कोमल चरण ॥ कंटक पाषाण खुपतील ॥८९॥

आंधळें जातां वनांतरीं ॥ सांगाती टाकूनि गेला दुरी ॥ तें तळमळून शोक करी ॥ माझी परी तेंवी जाहली ॥१९०॥

कीं तान्हें टाकूनि परदेशीं ॥ माता जाय सहगमनासी ॥ तें तळमळी जेंवी परदेशी ॥ जाहलें तैसें रामाविण ॥९१॥

वनीं निघतां रविकुळमंडण ॥ दुःखें उलथती कठिण पाषाण ॥ गज तुरंग पशु पक्षी संपूर्ण ॥ तृण जीवन न घेती ॥९२॥

वना जातां जनकजामात ॥ वनीं पक्षी रुदन करित ॥ अयोध्येच्या प्रजा समस्त ॥ पाठीं धांवती रामाचे ॥९३॥

श्रीरामाचे आवडते ब्राह्मण ॥ भक्त मित्र सेवकजन ॥ चर्मक अनामिक आदिकरून ॥ कुटुंबें घेऊनि चालिले ॥९४॥

ओस पडलें अयोध्यापुर ॥ अबालवृद्ध धांवतीं समग्र ॥ म्हणती सेवूं कांतार ॥ श्रीरामचंद्रा सांगातें ॥९५॥

कैकयी चांडाळीण खरी ॥ सीतेचीं वस्त्रें भूषणें हरी ॥ तिजखालीं दुराचारी ॥ कोण येथे नांदेल ॥९६॥

दशरथ आतां देईल प्राण ॥ ओस पडेल अयोध्यापट्टण ॥ कैकयीचें शिर वपन करून ॥ छत्र धरोत कोणीही ॥९७॥

एक म्हणती हा दशरथ ॥ दग्ध जाहला याचा पुरुषार्थ ॥ कैकयीस वधून रघुनाथ ॥ कां हो राज्यीं स्थापीना ॥९८॥

स्त्रीलोभें जाहला दीन ॥ वनासी पाठविला श्रीराम निधान ॥ एक म्हणती वनासी गमन ॥ करावें हा निर्धार ॥९९॥

दूर टाकिलें अयोध्यापुर ॥ धांवती नगरजनांचे संभार ॥ माघारा पाहे रघुवीर ॥ तों लोक सत्वर धांवती ॥२००॥

तत्काळ उभा केला रथ ॥ सकळ जनांसी हात जोडित ॥ म्हणे शिरीं आहे राजा दशरथ ॥ निजगृहीं स्वस्थ राहावें ॥१॥

आम्ही सेवितों घोर कानन ॥ तुम्हांसी तेथे न घडे आगमन ॥ आम्ही सत्वर येती परतोन ॥ चतुर्दश वर्षें होतांचि ॥२॥

ऐसें श्रीरामें विनविलें ॥ लोक भिडेनें अवघे परतले ॥ रुदन करीत अयोध्येस आले ॥ शोकें जाहले निस्तेज ॥३॥

तरी श्रीरामभक्त ब्राह्मण ॥ अग्निहोत्री पंडित सज्ञान ॥ त्यांवरी प्रलयचि वर्तला पूर्ण ॥ प्रियप्राण राघवाचे जे ॥४॥

ते सर्वथा न सोडिती रामातें ॥ म्हणती आम्ही येऊं काननातें ॥ बहुत प्रर्थिलें रघुनाथ ॥ परी कदा न राहती ॥५॥

रथाखालीं उतरून ॥ धरी ब्राह्मणांचे चरण ॥ ते म्हणती गेलिया प्राण ॥ तुज सोडूं राघवा ॥६॥

रघुनाथासी म्हणे सुमित्रासुत ॥ ब्राह्मण श्रम पावले समस्त ॥ आज यांसाठीं राहावें येथ ॥ अहल्योद्धारा राघवा ॥७॥

असो वासरमणि गेला अस्ता ॥ अयोध्येंत काय जाहली अवस्था ॥ स्त्रियांनीं धरून दशरथा ॥ कैकयीसदनाप्रति गेल्या ॥८॥

कौसल्या सुमित्रा आदिकरून ॥ बसती दशरथासी वेष्टून ॥ सदना समस्त दीपेंविण ॥ भणभणित दिसती पैं ॥९॥

बाहेर जातां रघुनाथ ॥ अवदशा प्रवेशली नगरांत ॥ जैसा विवेक जातां यथार्थ ॥ अज्ञान हृदयीं प्रवेशे ॥२१०॥

राण्या आणि दशरथ ॥ प्राण द्यावया होऊनि उदित ॥ महाविष आणिलें त्वरित ॥ जे स्पर्शतां घात करी प्राणाचा ॥११॥

तंव तो वसिष्ठ श्रीगुरुनाथ ॥ म्हणे सहसा न कीजे आत्मघात ॥ मग वाल्मीकाचा मूळकाव्यार्थ ॥ समस्तांसी सांगितला ॥१२॥

सहपरिवारें दशग्रीव ॥ वधून बंदींचे सोडवील देव ॥ चतुर्दश वर्षांनी राघव ॥ गजरें येईल स्वधामा ॥१३॥

जरी मी असत्य बोलेन ॥ तरी श्रीरघुनाथाची आण ॥ गुरुवचन मानुनि प्रमाण ॥ विषपान वर्जियेलें ॥१४॥

इकडे वनीं राहिला जगदुद्धार ॥ तो पद्मोद्भवजनक उदार ॥ स्मरारि मित्र रघुवीर ॥ सकळविप्रवेष्टित ॥१५॥

रात्र जाहली तीन प्रहर ॥ रथवेष्टित निजले द्विजवर ॥ जैसा उड्डगणवेष्टित रोहिणीवर ॥ कीं किरणचक्रीं चंडांशु ॥१६॥

निद्रार्णवीं निमग्न ब्राह्मण ॥ ऐसें जाणोनि सीतारमण ॥ सौमित्रासी म्हणे रथ वेगेंकरून ॥ येथोनियां काढीं कां ॥१७॥

काया जैसी असोन ॥ केव्हां जाय न कळे प्राण ॥ तैसा रथारूढ रघुनंदन ॥ न लागतां क्षण पैं गेला ॥१८॥

अयोध्येकडे दावूनि माग ॥ मग रथ मुरडिला सवेग ॥ जैसा अमृतहरणी स्वर्ग ॥ खगनायक आक्रमी ॥१९॥

असो आकाशमार्गीं रथ ॥ श़ृंगवेरापाशीं उतरत ॥ मानससरोवरीं अकस्मात ॥ राजहंस बैसले जैसे ॥२२०॥

तेथें गुहकाचा आश्रम निर्मळ ॥ पुढें वाहे जान्हवीजळ ॥ देखोनियां प्रातःकाळ ॥ घननीळ स्नान करी ॥२१॥

पाहूनियां भागीरथी ॥ म्हणे सूर्यवंशीं भगीरथ नृपति ॥ तेणें प्रार्थूनि नानारीतीं ॥ जगदुद्धारा आणिली ॥२२॥

कीं शिवमुकुटींची शुभ्र माळा ॥ प्रसाद दिधला शीघ्रकाळा ॥ फोडून ब्रह्मकटाह सकळा ॥ परब्रह्मजळ लोटलें ॥२३॥

ब्रह्मा पुरंदर उमावर ॥ ऋषीगण गंधर्व फणिवर ॥ देखतां जान्हवीचें नीर ॥ स्तुति अपार करिती पैं ॥२४॥

दृष्टीं पाहतां जान्हवीनीर ॥ सहस्र जन्मींचें पातक समग्र ॥ शुष्क दग्ध वन वैश्र्वानर ॥ अघ सर्व जळे तेंवी ॥२५॥

ऐसी ते सगरकुळतारिणी ॥ राम लक्ष्मण स्तावोनी ॥ स्नान करिती ते क्षणीं ॥ सीता सुमंत सर्वही ॥२६॥

नित्यकर्म सारूनि सकळीं ॥ न्यग्रोधवृक्षाचिये तळीं ॥ श्रीराम बैसें ते वेळीं ॥ तृणशेज घालूनियां ॥२७॥

वटदुग्ध घालोनि तये वेळीं ॥ रघुवीर मस्तकीं जटा वळी ॥ भस्मचर्चित चंद्रमौळी ॥ तैसा ते काळीं राम दिसे ॥२८॥

असो इकडे ब्राह्मण समस्त ॥ जागे होऊनि जंव पाहत ॥ तों रथासहित रघुनाथ ॥ गेला निश्र्चित समजलें ॥२९॥

परम खेद करिती ब्राह्मण ॥ निद्रा नव्हे हा अनर्थ पूर्ण ॥ हातींचा गेला रघुनंदन ॥ आनंदघन जगद्रुरु ॥२३०॥

अज्ञान पांघरूण पडलिया ॥ मग आत्माराम न ये प्रत्यया ॥ न दिसे जवळ असोनियां ॥ दुर्घट माया पडली हे ॥३१॥

एक म्हणती राम करुणाघन ॥ दशरथ राव सोडील प्राण ॥ म्हणोनि गेला परतोन ॥ सीताजीवन जगदात्मा ॥३२॥

तों रथचक्रांचा मार्ग ॥ अयोध्येकडे दिसे सवेग ॥ ब्राह्मण धावती काढिती माग ॥ परम आनंदले मनीं पैं ॥३३॥

हर्षयुक्त ब्राह्मण ॥ प्रवेशले अयोध्यापट्टण ॥ तों तेथें नाहीं रघुनंदन ॥ भवबंधनच्छेदक जो ॥३४॥

सकळ मंगळभोग वर्जूनि ॥ ब्राह्मण बैसलें निरंजनीं ॥ म्हणती श्रीरामदर्शनावांचोनि ॥ प्रवेश सदनीं न करूंचि ॥३५॥

आतां जान्हवीजवळ लंघून ॥ कैसा जाईल रघुनंदन ॥ ती कथा कौतुकें श्रवण ॥ सज्जन करोत आदरें ॥३६॥

अहो श्रीरामविजय ग्रंथ ॥ हें केवळ स्वानंदामृत ॥ संत हे निर्जर समस्त ॥ ब्रह्मानंदें सेविती ॥३७॥

रविकलमंडणा राघवेंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ श्रीधरवरदा अतिउदारा ॥ निर्विकारा अभंगा ॥३८॥

स्वति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ दशमाध्याय गोड हा ॥२३९॥

श्रीरामचंद्रार्पणमस्त||

श्रीरामविजयअध्याय ११ वा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्यायापरीस अध्याय परिकर ॥ जैसा पळोपळें चढे दिनकर ॥ कीं शुक्लपक्षींहून चंद्र-॥ कळा विशेष वाढती ॥१॥

कीं अभ्यास करितां वाढे ज्ञान ॥ कीं योगसाधनें समाधान ॥ कीं वटबीज विस्तारे पूर्ण ॥ दिवसेंदिवस अधिक पैं ॥२॥कीं बाळपणापासूनि पंडित ॥ अधिकाधिक व्युत्पत्ति वाढत ॥ कीं कृष्णावेणी संकीर्ण दिसत ॥ पुढें विशाळ होती जैशा ॥३॥

कीं अग्रापासूनि मुळाकडे ॥ इक्षुदंडाची गोडी वाढे ॥ कीं गुरुभजन करितां आतुडे ॥ ज्ञानकळा विशेष ॥४॥

जों जों नेम शुचिष्मंत ॥ तों तों तपश्र्चर्या वाढत ॥ कीं साधुसमागम करितां त्वरित ॥ क्षमा दया वाढती ॥५॥

कीं करितां निष्काम दान ॥ कीर्तीनें भरे त्रिभुवन ॥ कीं वीरश्रीची धरितां आंगवण ॥ प्रताप विशेष वाढे पैं ॥६॥

किंवा धरितां स्नेहादर ॥ मैत्री वाढे अपार ॥ किंवा करितां परोपकार ॥ यश विशेष वाढत ॥७॥

तैसी रामकथा गोड बहुत ॥ विशेष पुढें रस चढत ॥ जेवीं वर्षाकाळीं पूर येत ॥ गंगेस जैसा उल्हासें ॥८॥

गंगेचा पूर मागुता ओहटे ॥ हा दिवसेंदिवस अधिक वाटे ॥ चतुर प्रेमळ जरी श्रोता भेटे ॥ तरी वक्त्यासी आनंद ॥९॥

श्रोता भेटलिया मतिमंद ॥ तरी मावळे व्युत्पत्तीचा आनंद ॥ जैसें सूर्य मावळतां अरविंद ॥ संकोचोनि जाय पैं ॥१०॥

असो दशमाध्यायीं कथन ॥ जान्हवीतीरीं रघुनंदन ॥ न्यग्रोध वृक्षातळीं जाण ॥ तृणशेजे पहुडला ॥११॥

त्यजोनियां मायाजाळ ॥ निरंजनीं योगी जैसा निश्र्चळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ जान्हवीतीरीं शोभला ॥१२॥

तों तेथें गुहक भक्त थोर ॥ तयासी म्हणे राघवेंद्र ॥ परतीरासि सत्वर ॥ आम्हां आतां नेईं तूं ॥१३॥

भवाब्धि तरावया दुस्तर ॥ नामनौका जयाची पवित्र ॥ तो रघुवीर राजीवनेत्र ॥ प्रार्थना करी गुहकाची ॥१४॥

भणगापुढें क्षीरसागर ॥ म्हणे मज भूक लागली थोर ॥ कीं वाचस्पति मूढास विचार ॥ पुसतसे साक्षेपें ॥१५॥

कीं थिल्लरासी जन्हुकुमरी ॥ म्हणे माझी तृषा हरी ॥ किंवा दरिद्रियाचे द्वारीं ॥ कल्पवृक्ष याचक ॥१६॥

तैसा राम गुहाकातें ॥ म्हणे परपारा नेईं मातें ॥ तंव तो जाणोनियां राघवातें ॥ पुसे कौतुकें करूनियां ॥१७॥

म्हणे तुमचें नांव करूं श्रवण ॥ कोठें जातां काय कारण ॥ मग मेदिनीगर्भरत्नभूषणें ॥ काय बोलतां जाहला ॥१८॥

रविकुळमंडळ दशरथ ॥ तो पिता आमुचा यथार्थ ॥ या देहास नाम रघुनाथ ॥ जन समस्त बोलती ॥१९॥

ऐसें बोलतां रघुनंदन ॥ गुहकमाता करी रुदन ॥ म्हणे याचा नौकेसी लागतां चरण ॥ नारी संपूर्ण होईल ॥२०॥

याचे चरणरज झगडतां ॥ शिळज्ञ उद्धरली मिथिलेसी जातां ॥ आम्हीं पूर्वींच ऐकिली कथा ॥ भक्तसंतांचेनि मुखें ॥२१॥

कठिण पाषाण लागतां चरणीं ॥ इंदिरेतुल्य जाहली कामिनी ॥ नौका काष्ठाची तत्क्षणीं ॥ चरण लागतां होईल ॥२२॥

वृद्धा म्हणे पुत्रा अवधारीं ॥ यासी न घालावें नावेवरी ॥ नौकेची जाहलिया नारी ॥ कैसी जीविका तुझी होय ॥२३॥

एक वनिता पोसितां ॥ तुज संकट होय तत्वतां ॥ नावेवरी रघुनाथा ॥ पुत्रा सर्वथा बैसवूं नको ॥२४॥

मग गुहक म्हणे सर्वोत्तमा ॥ अगाध तुझे चरणांचा महिमा ॥ तरी ते चरण श्रीरामा ॥ मी प्रक्षाळीन स्वहस्तें ॥२५॥

पाषाणाची जाहली नारी ॥ हे तों चरणरजांची थोर ॥ तरी ते पद प्रक्षाळीन निर्धारीं ॥ मग नावेवरी बैसवीन ॥२६॥

मग गुहकें आश्रमास नेऊन ॥ बैसविला जगन्मोहन ॥ जो मायातीत शुद्ध चैतन्य ॥ पद्माक्षीरमण जगद्रुरु ॥२७॥

विधि हर सहस्रनयन ॥ ज्याचे वांछिती रजःकण ॥ सनकादिकां दुर्लभ पूर्ण ॥ करितां साधन नातळे जो ॥२८॥

जेथूनि जन्मली जन्हुकुमरी ॥ ते चरण प्रक्षाळून स्वकरीं ॥ फळें मूळ आणूनि झडकरी ॥ जनकजामात पूजिला ॥२९॥

ते वेळीं गुहकाचा हर्ष पाहें ॥ ब्रह्मांडामाजीं न समाये ॥ दृढ समाये ॥ दृढ धरूनि श्रीरामाचे पाय ॥ प्रेमेंकरून स्फुंदत ॥३०॥

म्हणे स्वामी रविकुलतिलका ॥ दयाब्धे मायाचक्रचाळका ॥ अयोध्यापते ताटिकांतका ॥ झडकरीं येईं मागुती ॥३१॥

स्वामी तूं परतोन आलियावीण ॥ मी कदापि न भक्षी अन्न ॥ नाना भोग मंगलस्नान ॥ न करीं येथूनि श्रीरामा ॥३२॥

जाणोनियां प्रेमळ भक्त ॥ श्रीराम त्यासी हृदयीं धरित ॥ मग नौका आणूनि त्वरित ॥ जनकजामात बैसविला ॥३३॥

सौमित्र आणि सीता सती ॥ तिघें नौकेवरी आरूढती ॥ मग सुमंताप्रति रघुपति ॥ आज्ञा देता जाहला ॥३४॥

सुमंता तूं जाय वेगें ॥ सकळ वृत्तांत रायासि सांगें ॥ माझा नमस्कार साष्टांगें ॥ वसिष्ठदशरथांसी सांगें कां ॥३५॥

चतुर्दश वर्षें होतां पूर्ण ॥ मी सत्वर येतों परतोन ॥ सकळ लोकांचें समाधान ॥ करी सुमंता जाऊनियां ॥३६॥

तुवां जाऊनियां त्वरित ॥ ग्रामासि आलिया बंधु भरत ॥ क्रोधेंकरून दशरथ ॥ वधील एकादा तयासी ॥३७॥

याकारणें तुवां सुमंता ॥ वेगें परतोनि जावें आतां ॥ सुमंत उतरून रथाखालता ॥ चरणीं माथा ठेवितसे ॥३८॥

नयनोदकेंकरून ॥ प्रक्षाळिले श्रीरामचरण ॥ सुमंत म्हणे माझेन ॥ अयोध्येस न जाववे ॥३९॥

मी समागमें येईन ॥ अथवा येथें प्राण देईन ॥ परी मी न जाय परतोन ॥ दुःख द्यावया समस्तां ॥४०॥

देखती जेव्हां रथ रिता ॥ दशरथ आणि कौसल्या माता ॥ त्यांची करावया हत्या ॥ माझेन तेथें न जाववे ॥४१॥

वनीं सांडून तुज रघुनायका ॥ प्रवेशतां अयोध्येंत देखा ॥ मज म्हणती काळमुखा ॥ कां तूं येथें आलासी ॥४२॥

मग रघुनाथें धरिलें हृदयीं ॥ म्हणे बारे चिंता न करी कांहीं ॥ तूं अयोध्येसी शीघ्र जाईं ॥ आज्ञा माझी पाळी कां ॥४३॥

माथां ठेविला वरदहस्त ॥ तेणें शोक समस्त जाहला शांत ॥ जैसा मेघ वर्षतां अद्भुत ॥ वणवा त्वरित विझोनि जाय ॥४४॥

मग आज्ञा घेऊनि सुमंत ॥ पैलतीरीं उभा अवलोकित ॥ नावेंत बैसला रघुनाथ ॥ गुहक पैलतीरा नेत पैं ॥४५॥

जैसा निवृत्तितटाकीं योगी पावत ॥ तैसा पैलतीरा उभा रघुनाथ ॥ सुमंतासी हातें पालवित ॥ जाय त्वरित माघारा ॥४६॥

यावरी पुढें पुष्करिणी ॥ तेथें क्रमिली एक रजनी ॥ मग प्रयागाप्रति चापपाणी ॥ येता जाहला ते वेळे ॥४७॥

दृष्टी देखोनि रघुनंदन ॥ प्रयागही जाहला पावन ॥ पुढें भरद्वाजआश्रमा रघुनंदन ॥ येता जाहला साक्षेपें ॥४८॥

आला ऐकोनि रघुराज ॥ सामोरा धांवला भरद्वाज ॥ रामें नमस्कारिला द्विज ॥ क्षेमालिंगन दीधलें ॥४९॥

भरद्वाज बोले सप्रेम ॥ आजि माझा सुफळ जन्म ॥ त्रिभुवनपति श्रीराम ॥ गृहा आला म्हणोनियां ॥५०

माझिया पुण्याचे गिरीवर ॥ भेदोनि गेलें चिंदंबर ॥ तरीच सीतावल्लभ रघुवीर ॥ मूळेंविण पातला ॥५१॥

सकळमंगलदायक रघुवीर ॥ जो मंगल भगिनीचा निजवर ॥ मंगलमातेचा उद्धार ॥ करावया जात प्रदक्षिणे ॥५२॥

तो पंचद्वयरथनंदन ॥ करावया सुरांचें बंधमोचन ॥ कमळिणीमित्रकुलभूषण ॥ येणें पंथें चालिला ॥५३॥

तो ऋषि धांवती अपार ॥ त्यांहीं कैसा वेष्टिला रघुवीर ॥ जैसा देवीं वेष्टिला सहस्रनेत्र ॥ कीं किरणांत मित्र विराजे ॥५४॥

कीं चंदनें वेष्टित मलयानिळ ॥ कीं विरक्तीं वेष्टिला जाश्र्वनीळ ॥ की वराभोंवते सकळ ॥ वऱ्हाडी जैसी मिरवती ॥५५॥

कीं साधक जैसे निधानाजवळी ॥ कीं रत्नाभोंवतीं परीक्षकमंडळी ॥ कीं कनकाद्रिभोंवतीं ॥ पाळी ॥ कुलाचलांची विराजे ॥५६॥

कीं नक्षत्रें वेष्टिला शशी ॥ कीं मानस वेष्टिलें राजहंसीं ॥ तैसा ऋषींनीं अयोध्यानिवासी ॥ भरद्वाज आश्रमीं वेष्टिला ॥५७॥

भरद्बाजें पूजिला रघुनंदन ॥ तेथें क्रमिला एक दिन ॥ ऋषि बोलती सुवचन ॥ अजनंदनपुत्राप्रति ॥५८॥

चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ श्रीरामा रहा येथें स्वस्थ ॥ दंडकारण्याप्रति व्यर्थ ॥ कासयासी जावें हो ॥५९॥

राघव म्हणे येथें राहतां ॥ अयोध्येच्या प्रजा येतील समस्ता ॥ ब्राह्मण आणि माता पिता ॥ येतील भेटीस निश्र्चयें ॥६०॥

आम्ही गुप्तरूपें येथूनी ॥ प्रवेशूं महाकाननीं ॥ पुढील भविष्यार्थ मनीं ॥ मुनि तुम्हीं जाणतसां ॥६१॥

असो ऋषि आश्रमीं क्रमोनि एक दिवस ॥ ऋषींस पुसे अयोध्याधीश ॥ पुढें चालिला जगन्निवास ॥ मार्ग आम्हांस दाविजे जी ॥६२॥

भरद्वाज म्हणे चित्रकूटपर्वतीं ॥ विद्वज्जन बहुत राहती ॥ तुम्ही तेथें करावी वस्ती ॥ कांही दिवस राघवा ॥६३॥

भरद्वाजें बोळविला रघुनाथ ॥ आज्ञा घेऊनि त्वरित ॥ प्रयागासी परतला ॥६४॥

सिद्धवट देखोनि नमन ॥ करी पद्माक्षी रमण ॥ त्या सिद्धवटीं सावित्री पूर्ण ॥ सीता देखोन नमस्कारी ॥६५॥

विजयी होऊनि रघुनंदन ॥ वनींहून आलिया परतोन ॥ दोन लक्ष गोदानें येथें देईन ॥ ब्राह्मणसंतर्पण यथाविधि ॥६६॥

पुढें चित्रकूटपर्वतावरी ॥ चढला शरयुतीरविहारी ॥ तेथें वाल्मीक ऋषि तप करी ॥ बहुत ऋषींसमवेत ॥६७॥

जेणें नारदकृपेचेनि बळें ॥ अवतारभविष्य कथियेलें ॥ जैसें कमळा अगोदर भरिलें ॥ सरोवरीं जळ जेवीं ॥६८॥

अवताराआधीं जन्मपत्र ॥ केलें शतकोटी विस्तार ॥ तेणें दृष्टीं देखतां रघुवीर ॥ आश्रमाबाहेर धांवला ॥६९॥

वाल्मीकाचे निजचरणीं ॥ माथा ठेवी मोक्षदानी ॥ वाल्मीकें वरचेवर उचलोनी ॥ अलिंगन दीधलें ॥७०॥

इतरां समस्त द्विजवरां ॥ भेटला परात्पर सोयरा ॥ सौमित्रें चित्रकूटीं ते अवसरा ॥ पर्णकुटिका बांधिली ॥७१॥

ऋषिमंडळींत रघुवीर ॥ चित्रकूटीं राहिला जगदुद्धार ॥ गुहक पाठवून बाहेर ॥ समाचार नेला हो ॥७२॥

चित्रकूटीं राहिला रघुनायक ॥ सुमंतासी सांगे गुहक ॥ राघववियोगें दोघांसी दुःख ॥ अत्यंत जाहलें तेधवां ॥७३॥

गुहकें घरासी नेला ॥ म्हणे मी आतां राम कैं देखेन डोळां ॥ असो रथासहित सुमंत परतला ॥ वेगीं अयोध्येसी येतसे ॥७४॥

अयोध्या दिसे प्रेतवत ॥ रिता घेऊन प्रवेशला रथ ॥ सुमंत मुखावरी पल्लव घेत ॥ झांकोनि मुख चालिला ॥७५॥

सुमंत म्हणे आपुले मनीं ॥ श्रीराम टाकोनि आलों वनीं ॥ ऐशिया मज अभाग्यासी जननी ॥ काय व्यर्थ प्रसवली ॥७६॥

कैकयीसदनासमोर ॥ सुमंतें सोडोनि रहंवर ॥ मंदिरांत प्रवेशे सत्वर ॥ अति मुखचंद्र उतरला ॥७७॥

रिता आणिला माघारा रथ ॥ अयोध्येंत समस्तांसी जाहलें श्रुत ॥ घरोघरीं एकचि आकांत ॥ सीताकांतवियोगें ॥७८॥

इकडे कंठीं प्राण धरून ॥ कैकयीसदनीं अजनंदन ॥ सुमंतें तयासी देखोन ॥ नमन करूं लाजतसे ॥७९॥

राजा म्हणे टाकिलें राजीवनयना ॥ मज वाटतें माझिया प्राणा ॥ मूळ आलासी सत्वर ॥८०॥

जगद्वंद्य माझी वस्तु जाण ॥ टाकिली कोण वनीं नेऊन ॥ श्रीराम माझें निधान ॥ कोणें चोरें चोरिलें ॥८१॥

राजहंस माझा रघुनंदन ॥ पंकगर्तेत ठेविला रोवून ॥ माझें सुढाळ मुक्त पूर्ण ॥ भिरकावून दिधलें कोठें ॥८२॥

अन्नपूर्णावरहृदयींचें रत्न ॥ म्यां तुझे हातीं दिधलें पूर्ण ॥ घोर वनीं तें टाकून ॥ कैसा आलासी माघारा ॥८३॥

मज अंधाची काठी बळें ॥ हिरूनि कोणी नेली न कळे ॥ अरण्यामाजी माझीं बाळें ॥ उपवासी निराहारें ॥८४॥

सुंदर सुकुमार सुमनकळी ॥ माझी माउली जनकबाळी ॥ सुमंता रथाखालीं कैसी उतरली ॥ कैसी चालिली पंथीं सांग ॥८५॥

तिहीं भोजनें कोठें केलीं वनीं ॥ शयन केलें कोणे मेदिनीं ॥ सुमंता सांग मजलागुनी ॥ देह टाकूनि जाईन मी ॥८६॥

मग तो सुमंत म्लानवदन ॥ सांगे सकळ वर्तमान ॥ तीन दिवस निराहार पूर्ण ॥ तिघेंजणें पैं होतीं ॥८७॥

तृणासनीं राजीवनेत्र ॥ पहुडला घनश्यामगात्र ॥ पांघरावया अंबर ॥ आपाद मस्तक देखिला म्यां ॥८८॥

श़ृंगवेरपर्यंत ॥ म्यां बोळविला रघुनाथ ॥ ज्याचेनि नामें जग तरत ॥ तो गुहकें नेला परपारा ॥८९॥

मायानदीं उल्लंघून ॥ संत स्वरूपीं होती लीन ॥ तैसा पैलतीरा रघुनंदन ॥ दैदीप्यमान पाहिला म्यां ॥९०॥

याउपरी करुणाकरें ॥ अयोध्येसी जातां त्वरें ॥ तेथोनियां जगदुद्धारें ॥ निजकरें मज पालविलें ॥९१॥

राघवें साष्टांग नमन ॥ घातलें मग तेथून ॥ पुढें चरणचालीं रघुनंदन ॥ करीत गमन वनवासा ॥९२॥

जैसा अस्ता गेला दिनकर ॥ तैसा वनीं प्रवेशला रघुवीर ॥ याज्ञिककुंडामाजी वैश्र्वानर ॥ आच्छादित जैसा कां ॥९३॥

ऐसीं सुमंताचीं वचनें भूपाळ ॥ कर्णीं ऐकतांचि तात्काळ ॥ धबधबा तेव्हां वक्षःस्थळ ॥ पिटोन घेत ते समयीं ॥९४॥

सुमंता वनीं रघुनंदन ॥ कैसा परतलासी सोडून ॥ अरे तुझें हृदय निर्दय पूर्ण ॥ कैसा प्राण गेला नाहीं ॥९५॥

सुमंता तुझा थोर धीर ॥ वज्रापरी तुझें शरीर ॥ वनीं सांडोनि रघुवीर ॥ कैसा एथवरी आलासी ॥९६॥

गळामाजी गुंतला मीन ॥ तैसा तळमळी अजनंदन ॥ श्रीराम वियोगाचा अग्न ॥ जाळीत पूर्ण सर्वांगीं ॥९७॥

म्हणे धांव धांव बारे रघुनंदना ॥ सरोजनेत्रा सुहास्यवदना ॥ कोमलांगा माझिया प्राणा ॥ गेलासी वना टाकूनि ॥९८॥

हांक फोडिली दशरथें ॥ धांव माउलीये रघुनाथे ॥ मज सांडोनि तान्हयातें ॥ गेलासी वना दूरदेशा ॥९९॥

रामा चालिला माझा प्राण ॥ अंतकाळीं दावीं तुझें वदन ॥ ऐसें बोलतां वटारिले नयन ॥ सोडिला प्राण रामस्मरणें ॥१००॥

राम राम करितां दशरथ ॥ जाहला रामरूप यथार्थ ॥ खुंटला शोक समस्त हेत ॥ मात सर्व राहिली ॥१॥

पाहा शरीराचें कर्म गहन ॥ चोघे पुत्र दशरथास असोन ॥ एकही जवळी नसतां सोडिला प्राण ॥ मग सुमंत प्रधान धांवला ॥२॥

तेणे उशाशी मांडी दिधली ॥ सुमित्रा कौसल्या जवळी आली ॥ तेव्हां एकचि हांक जाहली ॥ महाशब्दें करूनियां ॥३॥

सप्तशत राण्या सकळ ॥ दुःखें पिटिती वक्षःस्थळ ॥ हडबडलें अयोध्यापुर सकळ ॥ शोक तुंबळ लोकांतें ॥४॥

आक्रोशें कौसल्या सुमित्रा रडत ॥ रामवियोगें दुःख बहुत ॥ त्यांत मृत्यु पावला दशरथ ॥ नाहीं अंत शोकातें ॥५॥

जैसें पायास डंखिजे महाव्याळें ॥ तों मस्तकीं वृक्षिकें ताडिलें ॥ कीं वणव्यांत प्राणी सांपडले ॥ त्यावरी तोडिलें तस्करांनीं ॥६॥

आधींच बहुत धाकेंकरून ॥ त्यावरी पडती पाषाण ॥ आधींच नवज्वरें गेला व्यापून ॥ त्यांत विषपान पैं झालें ॥७॥

आधींच गृहास लागला अग्न ॥ त्यावरी साह्य जाहला प्रभंजन ॥ कीं पूरीं जातां बुडोन ॥ तों गळां पाषाण बांधिला ॥८॥

व्याघ्रभयें पळतां उठाउठी ॥ तों रिसें कंठीं घातली मिठी ॥ तैसी कौसल्येस जाहली गोष्टी ॥ लल्लाट पिटी अवनीये ॥९॥

तों तेथें पातला ब्रह्मसुत ॥ म्हणे शोक कां करितां व्यर्थ ॥ आतां वेगीं आणोन भरत ॥ राज्यीं तया स्थापावा ॥११०॥

एक राजा उभा राहिल्याविण ॥ करूं नये राजाचें दहन ॥ आणि समीप नसतां नंदन ॥ कदा अग्न देऊं नये ॥११॥

मग तैलद्रोणींत साचार ॥ घातलें दशरथाचें शरीर ॥ वसिष्ठ म्हणे सुमंता सत्वर ॥ रथ घेऊनि धांवें कां ॥१२॥

सूर्योदय होतां येथें ॥ वेगीं घेऊनि यावें भरतातें ॥ त्याचे कर्णीं वोखटें तेथें ॥ सर्वथाही सांगूं नको ॥१३॥

वनास गेला रघुनंदन ॥ अथवा दशरथें सोडिला प्राण ॥ हें गुह्य त्यासी न सांगोन ॥ वेगें घेवोन येईंजे ॥१४॥

भरत केवळ श्रीरामभक्त ॥ ही गोष्ट ऐकतां विपरीत ॥ तात्काळ देह टाकील तेथ ॥ यालागीं श्रुत न करावें ॥१५॥

भक्त विरक्त चतुर वरिष्ठ ॥ जो ज्ञानगेंगेचा निर्मळ लोट ॥ जो विवेकररत्नांचा मुकुट ॥ एकनिष्ठ सुभट जो ॥१६॥

जो वैराग्यवैरागर पूर्ण ॥ जो आनंदभूमीचें निधान ॥ जो विरक्तवल्लीचें सुमन ॥ जो समुद्र सत्याचा ॥१७॥

जो शांतिवृक्षांचें पक्वफळ ॥ जो दयेचा आगर केवळ ॥ कीं उपरतीचा निर्मळ ॥ पूर्ण कुंभ उचंबळला ॥१८॥

ऐसा सर्वगुणीं अलंकृत ॥ वेगीं घेऊन ये भरत ॥ तैसाचि निघाला सुमंत ॥ आचार्यचरण वंदूनि ॥१९॥

वायुवेगें चालिला सुमंत ॥ स्वप्न देखे मातुळीं भरत ॥ कृष्णवर्णवस्त्रवेष्टित ॥ नारी एक देखिली ॥१२०॥

तिणें घेऊनियां करीं ॥ तैल जिरवी आपुलें शिरी ॥ भरत जागा होऊनि झडकरीं ॥ रुदन करी आक्रोशें ॥२१॥

म्हणे स्वप्न नव्हे हा दिसतो अनर्थ ॥ आम्हीं चौघे बंधु आणि दशरथ ॥ पांचांमाजी जीवघात ॥ होईल एकाचा निर्धारें ॥२२॥

आणि प्राणसखा अत्यंत ॥ तो अंतरेल दूर बहुत ॥ धरणीवरी मस्तक भरत ॥ आपटी शोकें तेधवां ॥२३॥

आक्रंदोनि हाक देती ॥ केवीं दृष्टीं रघुनाथ ॥ राजाधिराज दशरथ ॥ अंतरला ऐसें वाटतें ॥२४॥

तों मातुळ संग्रामजित ॥ भरतासी स्नेहें हृदयीं धरित ॥ शत्रुघ्नासी समजावित ॥ शोक व्यर्थ कां करितां ॥२५॥

रजनी सरतां तात्काळ ॥ सिद्ध करून चतुरंग दळ अयोध्येप्रति उतावेळ ॥ नेऊन पाठवितों तुम्हांतें ॥२६॥

ऐसें बोलतां सरली रजनी ॥ भरत शत्रुघ्न उठोनी ॥ नगराबाहेर येउनी ॥ मार्ग लक्षीत अयोध्येचा ॥२७॥

ऊर्ध्व वदनेंकरूनि चकोर ॥ विलोकित जैसा चंद्र ॥ कीं चक्रवाक चिंती दिवाकर ॥ किंवा मयूर मेघातें ॥२८॥

ऐसा अयोध्येचा मार्ग लक्षित ॥ तों एकाएकीं देखिला रथ ॥ वरी प्रधान सुमंत ॥ आरूढोनि येतसे ॥२९॥

मंद मंद येत रहंवर ॥ अश्र्वांचे नेत्रीं वाहे नीर ॥ ध्वजाचें विद्युत्प्राय चीर ॥ अति मलिन दिसतसे ॥१३०॥

वरी सुमंत म्लानवदन ॥ नेत्रीं वाहत अश्रुजीवन ॥ राघव लीला आठवून ॥ क्षणांक्षणां स्फुंदतसे ॥३१॥

मागुतीं वस्त्रें नेत्र पुसित ॥ तों शत्रुघ्न आणि भरत ॥ जवळी आले धांवोनि त्वरित ॥ चिन्हें विपरीत देखोनियां ॥३२॥

सुमंतें देखतांचि भरत ॥ वेगें रथाखालीं उतरत ॥ क्षेमालिंगन दोघां देत ॥ सांगे त्वरित बोलाविलें ॥३३॥

भरत सुमंताचें वदन ॥ क्षणक्षणां पाहे विलोकून ॥ म्हणे सख्या तुझे आरक्त नयन ॥ शोक झाले दिसती पैं ॥३४॥

काय अयोध्येचें वर्तमान ॥ सुखी आहे कीं रघुनंदन ॥ श्रीदशरथ क्षेमकल्याण ॥ सुखरूप आहे कीं ॥३५॥

सुमंत म्हणे सुखी रघुनंदन ॥ तुम्हांसी बोलाविलें त्वरेंकरून ॥ मग रथीं बैसत भरतशत्रुघ्न ॥ त्वरेनें शीघ्र चालिले ॥३६॥

पुढें धुरे बैसला सुमंत ॥ घडीघडी नेत्रांसी वस्त्र लावित ॥ तेणें भरत होय सद्रदित ॥ तों पुढें देखत अयोध्या ॥३७॥

प्राणरहित जैसें शरीर ॥ तैसें दिसे अयोध्यानगर ॥ कीं जीवनेंवीण सरोवर ॥ किंवा कांतार दग्ध जैसें ॥३८॥

कीं नारी जैसी भ्रताराविण ॥ कीं जननीविण तान्हें दीन ॥ कीं नासिकावांचोनि वदन ॥ अयोध्याभुवन तेवीं दिसे ॥३९॥

राजमंदिराचे ढळले कळस ॥ मंगलवाद्यांचा नाहीं घोष ॥ घरोघरीं नारी पुरुष ॥ शोक आक्रोशें करिताती ॥१४०॥

होतें दशरथाचें प्रेत ॥ सुमंतें तेथेंचि नेला रथ ॥ छत्र भंगलें देखतां भरत ॥ रथाखालीं पडियेला ॥४१॥

दशरथाचें प्रेत देखोनी ॥ भरत तेव्हां लोळें धरणीं ॥ अश्रुधारा वाहती नयनीं ॥ शोक गगनीं न समाये ॥४२॥

शोक समुद्रीं निमग्न ॥ जाहला कैकयीनंदन ॥ भोवतें सद्रद प्रजानन ॥ दुःखेकरून बोलती ॥४३॥

मग सुमंत प्रधानें सांवरूनि ॥ भरत बैसविला उठवोनि ॥ भरत विचार करी मनीं ॥ राम नयनीं पाहीन आतां ॥४४॥

संसारमाया सांडोन ॥ दशरथ पावला स्वर्गभुवन ॥ मीं आतां राघवचरण ॥ दृढ धरीन निजभावें ॥४५॥

विलोकितां श्रीरामवदन ॥ मी शोकावेगळा होईन ॥ प्रधानासी म्हणे मज नेऊन ॥ श्रीरामचरणांवरी घालावें ॥४६॥

वडील बंधु रघुनाथ ॥ दशरथासम यथार्थ ॥ रामसदनाकडे भरत ॥ मुरडोनियां चालिला ॥४७॥

परी वनास गेला रघुनंदन ॥ हें कोणासी न बोलवे वचन ॥ एक म्हणती देईल प्राण ॥ सीतारमण न देखतां ॥४८॥

तों ओरडत कौसल्यामाय ॥ भरत धांवोनि धरी दृढ पाय ॥ माये श्रीराम कोठें आहे ॥ तो लावलाहें दावी कां ॥४९॥

तों कौसल्येसी आली मूर्च्छना ॥ बोलतां न बोलवे वचना ॥ बा रे राम गेला तपोवना ॥ मग रायें प्राण त्यजियेला ॥१५०॥

भरतें ऐसें ऐकिलें ॥ लल्लाट भूमीवरी आपटिलें ॥ तें दुःख नवजाय वर्णिलें ॥ कल्पांत मांडला ते वेळीं ॥५१॥

अहा रघुवीरा राजीवनेत्रा ॥ नवमेघरंगा स्मरारिमित्रा ॥ जगद्वंद्या कोमलगात्रा ॥ कां ऊपेक्षिलें आम्हांतें ॥५२॥

ऐसे बोलोनियां भरत ॥ मेदिनीवरी अंग घालित ॥ माझी माउली रघुनाथ ॥ गेली निश्र्चित टाकोनि ॥५३॥

मेदिनीगर्भरत्नभूषण ॥ वनासी निघतां रघुनंदन ॥ दशरथें जेवीं सोडिला प्राण ॥ तैसें मरण मज कां न ये ॥५४॥

अद्यापि न ये मजला मृत्य ॥ कां मृत्यूच निमाला यथार्थ ॥ रामवियोगाचें दुःख अत्यंत ॥ मृत्यूसही न सोसवे ॥५५॥

धन्य धन्य राजा दशरथ ॥ कोमल हृदय प्रेमळ यथार्थ ॥ देह ठेवूनि विदेहजामात ॥ जवळ केला त्वरेनें ॥५६॥

तंव तो कमलोद्भवसुत ॥ आचार्य पातला त्वरित ॥ भरत जाऊनि चरण धरित ॥ मज रघुनाथ दाखवीं ॥५७॥

पहावया भरताचें मन ॥ वसिष्ठ काय बोले वचन ॥ तुज राज्य दिधल्याविण ॥ रायास अग्न देऊं नये ॥५८॥

आणि तुझिया मातेच्या मनांत ॥ तुज राज्य व्हावें प्राप्त ॥ वनास गेला जनकजामात ॥ तेंचि निमित्त जाण पां ॥५९॥

ऐसें ऐकतां ते अवसरीं ॥ परम दुःख पावला अंतरीं ॥ भरत आक्रंदत दीर्घस्वरीं ॥ राज्य करी म्हणतांचि ॥१६०॥

सुकुमार चंपककळिकेवरी ॥ चपळा पडतां न उरे उरी ॥ कीं कर्पूर जननीचे शिरीं ॥ शुंडाप्रहारीं ताडी गज ॥६१॥

कीं शस्त्रघायें तोडिली बाळें ॥ कीं वज्रघायीं चूर्ण कपाळें कीं अग्नींत पडलीं मुक्ताफळें ॥ तैसें वाटलें भरतातें ॥६२॥

श्रीराम गेला वनांतरी ॥ जरी मी येथें राज्य करीं ॥ तरी जितुकें ब्राह्मण पृथ्वीवरी ॥ म्यां वधिले स्वहस्तें ॥६३॥

जगद्वंद्यास वनीं सांडोन ॥ जरी मी अंगिकारीं राज्यासन ॥ विगतधवा जे जारीण ॥ तिचें गर्भस्थळ मी पावें ॥६४॥

रजस्वलेच्या शोणितासमान ॥ राज्यभिषेकाचें उदक पूर्ण ॥ मी आपुल्या उदरीं शस्त्र घालीन ॥ राज्यासन घ्या म्हणतां ॥६५॥

ज्यासी मृडानीवर ध्याय मनीं ॥ ज्याची अयोध्या हे राजधानी ॥ ते मी भोगितांचि ते क्षणीं ॥ महाचांडाळ मी जाहलों ॥६६॥

रघुवीर सांडोन काननीं ॥ जरी मी भोगीन राजधानी ॥ तरी जिव्हा जावो झडोनी ॥ कीटक पडोनि तत्काळ ॥६७॥

वनीं सांडोनि जगन्मोहन ॥ जरी मी घेईन राज्यासन ॥ तरी गुरुवध मद्यपान ॥ मात्रागमन घडे मज ॥६८॥

कलंक लागेल वासरमणी ॥ पाप प्रवेशेल गंगाजीवनीं ॥ मृगजळीं घटोद्भवमुनी ॥ जरी बुडोन जाईल ॥६९॥

चित्रकिरणाचियावरी ॥ चढती मुंगियांच्या हारी ॥ कीं वडवानळाचे शिरीं ॥ नृत्य करी पतंग ॥१७०॥

कीं ऊर्णनाभींच्या तंतुसूत्रीं ॥ जरी उचलेल धरित्री ॥ कीं तृणपाशें महाकेसरी ॥ जरी गुंतोन पडेल ॥७१॥

कीं मही उचलेल मशका ॥ जरी सुपर्णासी बाधेल आळिका ॥ दृष्टी देखतां दीपका ॥ मृगांक खालीं पडेल ॥७२॥

जरी हें घडेल ब्रह्मनंदना ॥ तरी मज होईल राज्यवासना ॥ ऐकोनि भरताच्या वचना ॥ वसिष्ठ जाहला सद्रद ॥७३॥

अहो तें भरताचें वचन ॥ वैराग्यवल्लीचें सुमन ॥ कीं विवेकनभींचें उडुगण ॥ प्रेमतेजें झळकत ॥७४॥

कीं तें भक्तिपंथींचें सरोवर ॥ कीं निश्र्चयभावें दिव्य नगर ॥ कीं तें विश्रांतीचें मंदिर ॥ वचनरूप प्रत्यक्ष ॥७५॥

असो तो कैकयीनंदन ॥ म्हणे स्वामी शिवतों तुझे चरण ॥ श्रीरघुवीराची मज आण ॥ राज्याभिषेक करूं नेदी ॥७६॥

कैकयीचें काळें वदन ॥ माता नव्हे ते लांव पूर्ण ॥ तीस आवडे रांडपण ॥ पतीचा प्राण घेतला ॥७७॥

मग वसिष्ठें जें जें चिंतिलें ॥ तें तें भरतासी निवेदिलें ॥ मंथरादासीचे बोलें ॥ कार्य नासलें सर्वही ॥७८॥

कलहकल्लोळसरिता ॥ ते ही मंथरा दासी तत्वतां ॥ कुबुद्धि शिकवूनि तुझी माता ॥ इणेंचि पाहें पां बोधिली ॥७९॥

ऐसी ऐकतांचि मात ॥ वेगें धांवे वीर भरत ॥ मंथरेची वेणी अकस्मात ॥ धरूनि शस्त्र काढिलें ॥१८०॥

मग धांवोनि ब्रह्मसुत ॥ भरताचा धरिला हात ॥ म्हणे स्त्री वधितां पाप अद्भुत ॥ कदा विपरीत करूं नको ॥८१॥

मग लत्ताप्रहारेंकरूनि ॥ भरतें ताडिलें तियेलागुनी ॥ त्रिवक्रकुब्जा तेथूनि ॥ नाम तियेसी जाहलें ॥८२॥

असो ब्रह्मपुत्रें तयेक्षणीं ॥ रामपादुका सिंहासनीं ॥ मणिमय रचित दिव्यरत्नीं ॥ सिंहासनीं स्थापिल्या ॥८३॥

त्यांवरी छत्र धरून ॥ मग राजदेह उचलून ॥ अग्निमुखीं समर्पून ॥ उत्तरकर्म भरत करी ॥८४॥

सप्तशत रायाच्या युवती ॥ अग्निप्रवेश तात्काळ करिती ॥ जैसी सूर्यकिरणें सामावती ॥ सूर्यासरसीं अस्तमानीं ॥८५॥

सुमित्रा आणि कौसल्या ॥ प्राण द्यावया सिद्ध जाहल्या ॥ मग वसिष्ठें वर्जिल्या ॥ शास्त्रप्रमाण रीतीनें ॥८६॥

पुत्रवंत्या स्त्रिया विशेष ॥ त्यांहीं न करावा अग्निप्रवेश ॥ तों कौसल्या म्हणे आम्हांस ॥ कशास व्यर्थ ठेवितां ॥८७॥

वनास गेला रघुनाथ ॥ परत्र पावला दशरथ ॥ आतां काय वांचूनि व्थर्थ ॥ काया अग्नींत निक्षेपूं ॥८८॥

मग वसिष्ठ सांगे वाहूनि आण ॥ तुम्हांस श्रीराम भेटवीन ॥ मग वनासी करील गमन ॥ पुढती आगमन करील पैं ॥८९॥

निवटोनि असुर समस्त ॥ अयोध्येसी येईल रघुनाथ ॥ हा वाल्मीकाचा मूळ काव्यार्थ ॥ माना यथार्थ सर्वही ॥१९०॥

गुरुवचन मानूनि प्रमाण ॥ चित्रकुटीं भेटेल रघुनंदन ॥ अग्निप्रवेश म्हणून ॥ वर्ज केला ते काळीं ॥९१॥

असो रात्र जाहली दोन प्रहर ॥ कैकयीनें येऊन सत्वर ॥ भरतासि एकांत विचार ॥ सांगे कैसा ऐका तें ॥९२॥

म्हणे पुत्रा ऐक वहिलें ॥ संकटीं म्यां राज्य साधिलें ॥ रामासी वनवासा पाठविलें ॥ नाना यत्नेंकरूनियां ॥९३॥

वना गेलें रामलक्ष्मण ॥ हें तूं परम मानीं कल्याण ॥ सत्वर घेईं छत्रीसिंहासन ॥ कांहीं अनमान करूं नको ॥९४॥

पितृवचन करावया प्रमाण ॥ वनास गेला रघुनंदन ॥ त्या शोकास्तव राव पावला मरण ॥ हेही जाण बरें जाहलें ॥९५॥

सापत्नबंधु राम निर्धारें ॥ त्यासीं वंचन करितां बरें ॥ देव दैत्य दायाद वैरें ॥ अद्यापिही वर्तती ॥९६॥

गरुड सर्व सापत्न ॥ वैरें वर्तती दोघेजण ॥ जरी तूं होसी माझा नंदन ॥ तरी वचन पाळीं हें ॥९७॥

भरतें ऐकतांचि तिची वाणी ॥ म्हणे उठें येथोनि चांडाळिणी ॥ तुझा वध केला असतां या क्षणीं ॥ परी माता म्हणोनि रक्षिली ॥९८॥

परम निर्दय तूं पापीण ॥ अमंगळ तूं लांव पूर्ण ॥ घेतला दशरथाचा प्राण ॥ जानकीजीवन धाडिला वना ॥९९॥

तूं सर्पीण होसी यथार्थ ॥ डंखोनि मारिला दशरथ ॥ माझा सखा रघुनाथ ॥ दूर वनासी धाडिला ॥२००॥

अध्याय अकरावाश्लोक २०१ ते २७०

पिता बंधु दोघेजण ॥ गेले ज्या पंथेकरून ॥ त्या मार्गें मीही जाईन ॥ ऊठ येथूनि पापरूपे ॥१॥

असो कैकयी गेली उठोन ॥ तों उदय पावला चंडकिरण ॥ भरतें वल्कलें वेष्टून ॥ भस्म लाविलें सर्वांगीं ॥२॥

सर्व अलंकार त्यागून ॥ वटदुग्धीं जटा वळून ॥ वनाप्रती कैकयीनंदन ॥ चरणचालीं चालिला ॥३॥

षोडशपद्में दळभार ॥ नगरलोक निघाले सत्वर ॥ ओस पडले अयोध्यापुर ॥ जीवमात्र चालिले ॥४॥

कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ शिबिकेंत बैसल्या ते क्षणीं ॥ वरी वस्त्रावरण घालूनी ॥ वाहनासहित झांकल्या ॥५॥

वसिष्ठादि सकळ ब्राह्मण ॥ सवें निघालें चारी वर्ण ॥ अयोध्येंत कैकयीवांचून ॥ नाहीं कोणी राहिलें ॥६॥

जन म्हणती ओस नगर ॥ कैकयीचें वपन करूं सत्वर ॥ तिजवरी धरावें छत्र ॥ परम अपवित्र पापिणी ॥७॥

तिचें पोटीं भरत जन्मला ॥ जैसा कागविष्ठेंत अश्र्वत्थ प्रगटला ॥ कीं कागिणी पोटीं कोकिळा ॥ निपजे अवचिता जैसी कां ॥८॥

असो भरत म्हणे सुमंतातें ॥ रघुवीर गेला कोण्या पंथें ॥ तोच मार्ग दावीं आम्हांतें ॥ तुझें अनुमतें चालूं आम्ही ॥९॥

मग भरतसमवेत दळभार ॥ गुहकाश्रमा पावले सत्वर ॥ वाजत वाद्यांचे गजर ॥ नादें अंबर कोंदलें ॥१०॥

गुहक विलोकी दुरून ॥ म्हणे मातेनें धाडिले दोघेजण ॥ दळभार सिद्ध करून ॥ रामलक्ष्मण वधावया ॥११॥

मग सहस्रांचे सहस्र किरात ॥ गुहकें मेळविले समस्त ॥ धनुष्य ओढोनियां त्वरित ॥ जान्हवीतीर बळकाविलें ॥१२॥

भरतासि सांगती सेवक ॥ संग्रामासी सिद्ध जाहला गुहक ॥ जन्हुकुमारीचें उदक ॥ स्पर्शों न देती कोणातें ॥१३॥

मग शत्रुघ्न आणि दळपती ॥ भरतासंगें विचार करिती ॥ म्हणती आज्ञा द्यावी निश्र्चितीं ॥ शिक्षा लावूं तयातें ॥१४॥

भरत म्हणे गुहक रामभक्त ॥ म्यां ऐकिला होता वृत्तांत ॥ तरी समाचार न घेतां यथार्थ ॥ युद्ध त्यासी न करावें ॥१५॥

मग भरत पुढें होऊन ॥ गुहकाप्रति बोले वचन ॥ त्वां युद्ध आरंभिलें निर्वाण ॥ काय कारण सांग तें ॥१६॥

गुहक म्हणे घेऊनि दळभार ॥ वधावया जातोसि रघुवीर ॥ तरी मी श्रीरामउपासक निर्धार ॥ वेंचीन प्राण स्वामीकाजीं ॥१७॥

माझा स्वामी रघुनंदन ॥ निराहार वनीं निर्वाण ॥ तुम्ही मारावया दोघेजण ॥ दळभारेंसी चालिलां ॥१८॥

परम निंदक दुर्जन खळ ॥ जे रघुनाथद्वेषी चांडाळ ॥ त्यांचीं शिरें छेदोनि तत्काळ ॥ पाठवीन यमलोका ॥१९॥

मातेच्या बोलेंकरूनि ॥ श्रीराम वधूं पाहसी वनीं ॥ तरी तुम्हांस जान्हवीचें पाणी ॥ स्पर्शों नेदीं अणुमात्र ॥२२०॥

ऐकतां गुहकाचें वचन ॥ भरतासी आलें दीर्घ रुदन ॥ गुहकास म्हणे सोडूनि बाण ॥ माझें शिर छेदोनी टाकीं ॥२१॥

मज पापियाचा देह त्वरित ॥ गुहका छेदीं यथार्थ ॥ कैकयीनें केला अनर्थ ॥ सीताकांत धाडिला वना ॥२२॥

जन्मलों कैकयीचे उदरीं ॥ जन म्हणती हा रामचंद्राचा वैरी ॥ तरी गुहका आतां वेग करीं ॥ छेदीं झडकरीं देह माझा ॥२३॥

श्रीरामावियोगाचें दुःख ॥ मज सोसवेचि अणुमात्र देख ॥ निर्वाण बाण सोडोनि एक ॥ मज रघुनायकपद दावीं ॥२४॥

भरताचें अंतर ओळखून ॥ गुहक धांवोनि धरी चरण ॥ दोघांसी पडिलें आलिंगन ॥ गेले विसरून देहभाव ॥२५॥

कंठ दाटला दोघांचा ॥ उभारणी जाहली रोमांचा ॥ दोघांचे नेत्रीं अश्रुधारांचा ॥ पूर पडत ते काळीं ॥२६॥

दोघेही श्रीरामचे भक्त ॥ दोघेही योगी विरक्त ॥ दोघेही श्रीरामास आवडत ॥ वल्कलेंवेष्टित दोघेही ॥२७॥

दोघांही केलें भस्मोध्दूलन ॥ दोघांही केलें जटावळण ॥ दोघेंही न घेती अन्न ॥ रामदर्शनावांचोनि ॥२८॥

गुहक म्हणे भरता वसिष्ठा ॥ श्रीराम गेला चित्रकूटा ॥ आतां चला जी उठा उठा ॥ वेगीं भेटा राघवातें ॥२९॥

ऐकतां गुहकाचें वचन ॥ भरत धरूं धावे चरण ॥ गुहक घाली लोटांगण ॥ प्रेमेंकरून सद्रद ॥२३०॥

भरतें स्नानसंध्या सारून ॥ गुहकासी म्हणे प्रीतीकरून ॥ श्रीराम राहिला एक दिन ॥ तें मज स्थळ दाविजे ॥३१॥

गुहक म्हणे न्यग्रोधवृक्ष ॥ त्याखालीं राहिला कमलपत्राक्ष ॥ जयासी हृदयीं ध्याय विरूपाक्ष ॥ सहस्राक्ष शरण ज्यातें ॥३२॥

या तृणशेजे वरी जाण पद्मनयनें केलें शयन ॥ याच पंथें येऊन ॥ केलें स्नान जान्हवीचें ॥३३॥

सीतेच्या तगटवस्त्रांचे रज ॥ ते न झगटती तृणशेज ॥ देखतां भरत भक्तराज ॥ साष्टांग नमन करीतसे ॥३४॥

रघुनाथपदमुद्रा तेथ ॥ उमटल्या देखोनि भरत ॥ ते धुळी कपाळा लावित ॥ सद्रदित होवोनि ॥३५॥

असो नौका आणोनि सहस्र ॥ उतरला सकळ दळभार ॥ प्रयागासी येऊन सत्वर ॥ भरद्वाजदर्शन घेतलें ॥३६॥

लक्षोनि चित्रकुटाचा पंथ ॥ चालती गुहक आणि भरत ॥ तों फळें वेंचावया सुमित्रासुत ॥ पर्वतातळीं उतरला ॥३७॥

तों पर्णकुटीमाजी रघुनंदन ॥ करावया बैसला हवन ॥ तेथें उपसामग्री आणोन ॥ जनकात्मजा देतसे ॥३८॥

चकोरमुखीं एकसरां ॥ अत्रिसुत सोडी अमृतधारा ॥ तैशा आहुती घाली वैश्र्वानरा ॥ तृप्त होय रामहस्तें ॥३९॥

तेव्हां आश्रमाबाहेर जनकबाळी ॥ जो सुकुमार चंपककळी ॥ तों सुदर्शनगंधर्वें जातां निराळीं ॥ ते वेल्हाळी देखिली ॥२४०॥

जानकी देखोनि सुंदर ॥ चित्तीं जाहला कामातुर ॥ भय लज्जा समग्र सोडोनियां दीधली ॥४१॥

मंगळरूप ते मंगळभगिनी ॥ गंधर्व धांवला ते क्षणीं ॥ अमंगळ कागरूप धरूनी ॥ सीतेलागीं झडपीतसे ॥४२॥

जैसा पतंग दीप देखोन ॥ उडी घाली विसरून मरण ॥ कीं खदिरांगारासी वृश्र्चिक येऊन ॥ पुच्छेंकरून ताडी जेंवि ॥४३॥

कीं अंतगृहींचें दिव्यान्न ॥ स्पर्शों धांवे जैसे श्र्वान ॥ यज्ञशाळेमाजी मळिण ॥ अंत्यज जैसा पातला ॥४४॥

असो जानकींचें स्तनयुग ॥ धरूं पाहे पतित काग ॥ जगन्माता धांवली सवेग ॥ आंग घाली घरणीतें ॥४५॥

मग म्हणे धांव धांव रघुराया ॥ कागें विटंबिली माझी काया ॥ आक्रंदे परम जनकतनया ॥ रघुवर्या जाणवलें ॥४६॥

आहुती टाकी रघुनाथ ॥ जवळी नाही सुमित्रासुत ॥ मग दर्भ मंत्रोनि त्वरित ॥ रामचंद्रें प्रेरिला ॥४७॥

कल्पांतविजूसमान ॥ कागें दर्भ देखिला दुरून ॥ पळों लागला घेतलें रान ॥ पाठीसी बाण लागला असे ॥४८॥

गंधर्व भ्रमे सकळ सृष्टी ॥ परी कोणी न घाली तया पाठीं ॥ हिंडता जाहला हिंपुटी ॥ होय कष्टी दुरात्मा ॥४९॥

इंद्रादिक देवगण ॥ समस्तांसी गेला शरण ॥ ते म्हणती न दाखवीं वदन ॥ दुष्टा होईं माघारा ॥२५०॥

मग भेटला नारद मुनि ॥ काग लागला तयाचे चरणीं ॥ म्हणे पहा हो या त्रिभुवनीं ॥ ठाव नेदी कोणी मज ॥५१॥

माझी पाठ न सोडी बाण ॥ मग नारद बोले वचन ॥ मूढा रामासी जाय शरण ॥ तोचि मरण चुकवील ॥५२॥

मग म्हणे जगद्वंद्या रामचंद्रा ॥ मी तुज शरण कृपासागरा ॥ दीनरक्षका अतिउदारा ॥ मज पामरा न मारावें ॥५३॥

मजवरी टाकिला बाण ॥ हें लोकांत न दिसे थोरपण ॥ कमळावरी वज्र घेऊन ॥ घातल्या काय पुरुषार्थ ॥५४॥

सूक्ष्म आळिका धरी सुपर्ण ॥ वडवानळ जाळी तृण ॥ भोगींद्र उचली सुमन ॥ हें काय अपूर्व बोलावें ॥५५॥

पर्जन्यें उठलें तृण ॥ अगस्ति प्याला किंचित जीवन ॥ मेघें निजप्रतापेंकरून ॥ घटीं जीवन भरियेलें ॥५६॥

सूर्यें दीपतेज झांकिलें ॥ गोवत्स विदारिला शार्दूलें ॥ रघुपति त्वां मज तैसें मारिलें ॥ तरी थोरपण प्रकटेना ॥५७॥

मातेचिया स्तनावरी ॥ बाळक हस्त ठेवूनि क्रीडा करी ॥ तरी काय माता जीवें मारी ॥ बाळकातें सांगपां ॥५८॥

महाराज रविकुळभूषणा ॥ ताटिकांतका अहल्योद्धारणा ॥ द्विपंचमुखदर्पहरणा ॥ शरणागता न मारावें ॥५९॥

मग बोले रघुपति ॥ माझा बाण असत्य कल्पांतीं ॥ नव्हेच जाण निश्र्चितीं ॥ महामलिना अपवित्रा ॥२६०॥

मग बाणासी अज्ञापी रघुनंदन ॥ याचा रक्षोनियां प्राण ॥ वेगें छेदावा सव्य नयन ॥ शिक्षा यास जाण पैं ॥६१॥

न लागतां पातया पातें ॥ दर्भें छेदिलें नयनातें ॥ काग म्हणे रघुत्तमातें ॥ देई वरातें मज कांहीं ॥६२॥

मग दोहींकडे एक बुबुळ ॥ खेळे ऐसें केलें चंचळ ॥ काकदृष्टी अवघ्यांत चपळ ॥ जन सकळ देखती ॥६३॥

सीतेसी द्यावया चुंबन ॥ तूं धावलासी दुरात्मा पूर्ण ॥ तरी तूं करिसी विष्ठाभक्षण ॥ कनिष्ठ जाण पक्ष्यांत तूं ॥६४॥

तुज वर एक देतो जाण ॥ प्रेतपिंड तूं भक्षल्याविण ॥ सर्वथा नोहे उद्धारण ॥ हें वरदान तुज दिधलें ॥६५॥

मग सुदर्शन गंधर्व तेव्हां ॥ साष्टांग नमोनि श्रीराघवा ॥ आपले स्वस्थळाप्रति तेधवां ॥ जाता जाहला आनंदें ॥६६॥

भरत प्राणसखा आतां ॥ येऊनि भेटेल रघुनाथा ॥ श्रोतीं परिसावी तेचि कथा ॥ भव्यव्यथा नासे जेणें ॥६७॥

रामविजय ग्रंथ प्रचंड ॥ रसभरित अयोध्याकांड ॥ तें श्रवण करितां वितंड ॥ विघ्नें उदंड वितळती ॥६८॥

अयोध्याधीशा रामचंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ श्रीधरवरदा प्रतापरुद्रा ॥ मज नाममुद्रा अखंड देईं ॥६९॥

स्वस्ती श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

एकदशोऽध्याय गोड हा ॥२७०॥

श्रीरामविजयअध्याय १२ वा

श्रीगणेशाय नमः

संतमंडळी बैसली थोर ॥ बृहस्पतीऐसे चतुर ॥ आतां साहित्यसुमनाचे हार ॥ गुंफोन गळां घालूं त्यांचे ॥१॥

अनर्ध्य शब्दरत्नें प्रकाशवंत ॥ त्यांचे ग्राहक चतुर पंडित ॥ विशेषें रघुनाथभक्त विरक्त ॥ ते प्रेमभरें डुल्लती ॥२॥

मतिमंद बैसतां श्रोता श्रवणीं ॥ तरी ग्रंथरस जाय वितळोनी ॥ जैसें भस्मामाजी नेऊनी ॥ व्यर्थ अवदान घालिजे ॥३॥रत्नपरिक्षा करिती चतुर ॥ तेथें गर्भांध विटे साचार ॥ गायन ऐकती सज्ञान नर ॥ परी बधिर तेथें विटती पैं ॥४॥

कमळसुवास सेविती भ्रमर ॥ परी तो स्वाद न जाणे दर्दुर ॥ हंस घेती मुक्तांचा चार ॥ परी तो बकासी प्राप्त नाहीं ॥५॥

दुग्ध दोहोनि नेती इतर ॥ गोचिड तेथें अहोरात्र ॥ वसे परी प्राप्त त्यास रुधिर ॥ नेणे क्षीर मतिमंद तो ॥६॥

कीं वसंतकाळीं कोकिळा ॥ पंचमस्वरें आळविती ॥ रसाळा ॥ काकजाती तैशा सकळा ॥ परी तयां तो स्वर नव्हेचि ॥७॥

बलाहक गर्जना करिती गगनीं ॥ मयुर नाचती पिच्छें पसरूनी ॥ परी ते कळा वृषभांनीं ॥ नेणिजे जैशी सर्वथा ॥८॥

चकोर चंद्रामृत सेविती ॥ परी ते कळा कुक्कुट नेणती ॥ म्हणोनि श्रोता मंदमती ॥ सहसाही न भेटावा ॥९॥

श्रोता भेटलिया चतुर ॥ ग्रंथरस वाढे अपार ॥ जेवीं वीर संघटतां थोर ॥ रणचक्रीं रंग भरे ॥१०॥

असो एकादशाध्यायाचे अंतीं ॥ चित्रकुटी राहिला रघुपति ॥ सुदर्शन गंधर्व निश्र्चितीं ॥ काकरूपी उद्धरिला ॥११॥

उपरी सिंहावलोकनें करूनि तत्वतां ॥ श्रोतीं परिसावी मागील कथा ॥ दळभारेंसी भरत तत्वतां ॥ चित्रकूटासमीप आला ॥१२॥

तंव तो भूधरअवतार ॥ चित्रकूटाखालीं सौमित्र ॥ फळें वेंचितां तो दळभार ॥ गजरें येतां देखिला ॥१३॥

ओळखिला आपला घ्वजसंकेत ॥ आले कळलें शत्रुघ्न भरत ॥ म्हणे कैकयीनें पाठविले यथार्थ ॥ वनीं रघुनाथ वधावया ॥१४॥

हे युद्धासी आले येथ ॥ जरी रघुनाथास करूं श्रुत ॥ तरी हेही गोष्ट अनुचित ॥ युद्ध अद्भुत करीन मी ॥१५॥

माझा श्रीराम एकला वनीं ॥ हे आले दळभार सिद्ध करूनी ॥ तरी जैसा वणवा लागे वनीं ॥ तैसें जाळीन सैन्य हें ॥१६॥

रवीच्या किरणांवरी देखा ॥ कैशा चढतील पिपीलिका । कल्पांतविजूस मशक मुखा-॥ माजी केंवि सांठवील ॥१७॥

चढून प्रळयाग्नीचे शिरीं ॥ पत्रग कैसा नृत्य करी ॥ ऊर्णनाभीचे तंतुवाभीतरीं ॥ वारण कैसा बांधवेल ॥१८॥

तृणपाशेंकरून ॥ कैसा बांधवे पंचानन ॥ द्विजेंद्रासी अळिका धरून । कैसी नेईल आकाशा ॥१९॥

दीपाचें तेज देखोन ॥ कैसा आहाळेल चंडकिरण ॥ तैसा मी वीर लक्ष्मण ॥ मज जिंकूं न शकती हे ॥२०॥

भार देखोनि समीप ॥ क्षण न लागतां चढविलें चाप ॥ बाण सोडिले अमूप ॥ संख्येरहित ते काळीं ॥२१॥

वाटे गडगडितां महाव्याघ्र ॥ थोकती जेवीं अजांचे भार ॥ तैसे सोळा पद्में दळभार ॥ भयभीत जाहला ॥२२॥

त्या बाणांचे करावया निवारण ॥ वीर सरसावला शत्रुघ्न ॥ दोघांचें समसमा संधान ॥ बाणें बाण तोडित ॥२३॥

एक चंद्र एक मित्र ॥ कीं रमावर आणि उमावर ॥ किंवा ते मेरुमंदार ॥ युद्धालागीं मिसळले ॥२४॥

एक समुद्र एक निराळ ॥ एक दावाग्नि एक वडवानळ ॥ एक गदा एक चक्र निर्मळ ॥ विष्णुआयुधें भिडती कीं ॥२५॥

एक वासुकी एक भोगींद्र ॥ एक वसिष्ठ एक विश्र्वामित्र ॥ तैसे शत्रुघ्न आणि सौमित्र ॥ बाण सोडिती परस्परें ॥२६॥

एकावरी एक सोडिती बाण ॥ ते वरचेवरीं उडविती संपूर्ण ॥ बाणमंडप जाहला सघन ॥ चंडकिरण न दिसेचि ॥२७॥

रामनामबीजांकित ॥ बाण सुटती सतेज मंडित ॥ रघुनाथ नाम गर्जत ॥ सुसाटे निघत येतांचि ॥२८॥

वाटे ओढवला प्रळयकाळ ॥ वनचरां सर्वां सुटला पळ ॥ ऋषीश्र्वर पळती सकळ ॥ कडे वेंधती पर्वताचे ॥२९॥

सांडोनि गुंफा तपाचरण ॥ पळती आपुला जीव घेऊन ॥ एक धांवतां धापा दाटून ॥ मूर्च्छा येऊनि पडियेले ॥३०॥

एक म्हणती राक्षसदळ ॥ आलें रामावरी तुंबळ ॥ येणें मखरक्षणीं राक्षस सबळ ॥ वीस कोटी निवाटिले ॥३१॥

तें वैर स्मरोनि अंतरीं ॥ सत्य हे आले राघवावरी ॥ आतां सोमित्राची कैंची उरी ॥ अनर्थ निर्धारीं ओढवला ॥३२॥

असो ऋषीश्र्वर समस्त ॥ आले जेथें रघुनाथ ॥ गोष्टी सांगतां बोबडी वळत ॥ संकेत दाविती एक करें ॥३३॥

एक रुदन करूनि फोडित हांका ॥ वेगें पळवीं जनककन्यका ॥ आतां गूढ विवरीं लपवीं कां ॥ रघुनायका ऊठ वेगीं ॥३४॥

न भरे जों अर्ध निमेष ॥ चढविलें श्रीरामें धनुष्य ॥ जैसा उगवतां चंडांश ॥ गुंफेबाहेर तैसा आला ॥३५॥

ऋषींस म्हणे अयोध्यानाथ ॥ तुम्ही मनीं न व्हावें दुश्र्चित्त ॥ काळही विघ्न करूं आलिया येथ ॥ खंडविखंड करीन बाणीं ॥३६॥

पडत्या आकाशा दईन धीर ॥ रसातळा उर्वी जातां करीन स्थिर ॥ तुम्ही समस्त बैसा धरूनि धीर ॥ तपश्र्चर्या करीत पैं ॥३७॥

अथवा करावें अध्ययन ॥ न्याय मीमांसा सांख्यज्ञान ॥ पातंजल अथवा व्याकरण ॥ यांची चर्चा करा जी ॥३८॥

असो पाठींसीं घालून ब्राह्मण ॥ पुढें चालिला रघुनंदन ॥ तो ध्वजचिन्हें ओळखिलीं पूर्ण ॥ शत्रुघ्न बाण टाकीतसे ॥३९॥

आपले भेटीकारणें उत्कंठित ॥ सद्रद जाहला भरत ॥ लक्ष्मणापाशीं सीतानाथ ॥ क्षण न लागतां पातला ॥४०॥

मग म्हणे सौमित्रासी ॥ बा रे भरत आला भेटीसी ॥ तूं किमर्थ यासी युद्ध करिसी ॥ पाहा मानसीं विचारूनि ॥४१॥

ऐसें बोलतां राजीवनेत्र ॥ परी वीरश्रियेनें वेष्टिला सौमित्र ॥ सोडितां न राहे शर ॥ मग रघुवीर काय करी ॥४२॥

हातींचें धनुष्य हिरूनी ॥ श्रीरामें घेतलें तये क्षणीं ॥ सौमित्र लागला श्रीरामचरणीं ॥ हास्यवदन करूनियां ॥४३॥

श्रीरामें वरितां फणिपाळ ॥ अवघें वितळलें बाणजाळ ॥ जैसें निजज्ञान ठसतां केवळ ॥ मायापडळ जेवीं विरे ॥४४॥

भरतासहित अयोध्येचे जन ॥ सर्वीं विलोकिला रघुनंदन ॥ जैसा निशा संपतां चंडकिरण ॥ उदयचळीं विराजे ॥४५॥

तों भरतासी न धरवे धीर ॥ सप्रेम धांव घेतली सत्वर ॥ वाटेसीं साष्टांग नमस्कार ॥ वारंवार घालीतसे ॥४६॥

कीं बहुत दिवस माता गेली ॥ ते बाळकें समीप देखिली ॥ कीं गाय वनींहूनि परतली ॥ वत्सें आटोपिली धांवूनियां ॥४७॥

कीं क्षीराब्धि देखोनि त्वरित ॥ धांव घेत क्षुधाक्रांत ॥ कीं मृगजळ देखानि त्वरित ॥ मृग धांवती उष्णकाळीं ॥४८॥

कीं सफळ देखोनि दिव्य द्रुम ॥ झेंपावे जैसा विहंगम ॥ भरतें धरूनि तैसा राम ॥ चरणसरोजीं स्पर्शिला ॥४९॥

जैसें लोभियाचें जीवित्व धन ॥ तैसें भरतें दृढ चरण ॥ नयनोदकें करून ॥ केलें क्षालन रामपायां ॥५०॥

मग उचलोनियां दोहीं करीं ॥ बंधूसीं आदरें हृदयीं धरी ॥ जैसा जयंतपुत्र सहस्रनेत्रीं ॥ प्रीतीकरोनी आलिंगिला ॥५१॥

की क्षीरसागरीं लहरिया उठती ॥ त्या एकांत एक मिसळती ॥ कीं वेदशास्त्री श्रुती ॥ ऐक्या येती परस्परें ॥५२॥

तैसा अलिंगिला भरत ॥ तों शत्रुघ्न लोटांगण घालित ॥ परम प्रीतीं रघुनाथ ॥ आलिंगन देती तयातें ॥५३॥

सकळ अयोध्येचे ब्राह्मण ॥ रामासी भेटती प्रीतीकरून ॥ सर्व दळभार प्रजानन ॥ करिती नमन रामासी ॥५४॥

लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ परस्परें देती क्षेमालिंगन ॥ मग सुमंत प्रधानें येऊन ॥ श्रीरामचरण वंदिले ॥५५॥

मग सुमंत म्हणे रघुराया ॥ पैल वसिष्ठ आणि दोघी माया ॥ तंव त्या दशरथकुळवर्या ॥ धीर न धरवे ते काळीं ॥५६॥

सामोरा चालिला रघुनंदन ॥ भोंवते अपार अयोध्याजन ॥ जैसा कां वेदोनारायण ॥ अनेक श्रुतीं वेष्टिला ॥५७॥

येऊनियां वसिष्ठाजवळी ॥ रामें गुरुचरण वंदिले भाळीं ॥ जैसा मदनदहनाचे चरणकमळीं ॥ स्कंद ठेवी मस्तक ॥५८॥

तों कौसल्या सुमित्रा माता ॥ त्यांचीं वाहनें जवळी देखतां ॥ धांवोनी येतां रामसुमित्रासुतां ॥ उतरती खालत्या दोघीजणी ॥५९॥

कौसल्येचे चरणीं मस्तक ॥ ठेवूनि बोले रघुनायक ॥ म्हणे सुखीं कीं मम जनक ॥ श्रीदशरथ दयाब्धि ॥६०॥

तों जाहला एकचि कल्लोळ ॥ रुदन करिती लोक समग्र ॥ सुमित्राकौसल्येसी बहुसाल ॥ नाहीं पार तयातें ॥६१॥

वसिष्ठ म्हणे रघुनाथा ॥ तुझा वियोग न साहे दशरथा ॥ रामराम म्हणतां मोक्षपंथा ॥ गेला तात्काळ जाण पां ॥६२॥

वचन ऐसें ऐकतां कानीं ॥ करुणासागर मोक्षदानी ॥ विमलांबुधारा नयनीं ॥ तेच क्षणीं चालिल्या ॥६३॥

स्फुंदस्फुंदोनि विलाप थोर ॥ पित्यालागीं करी रघुवीर ॥ म्हणे पूर्ण सत्याचा सागर ॥ श्रीदशरथ वीर जो ॥६४॥

ज्याचे युद्धाची ठेव ॥ पाहती मानव इंद्रादि देव ॥ वृषपर्वा शुक्रादि सर्व ॥ दैत्य युद्धीं जिंकिले ॥६५॥

श्रोते म्हणती नवल येथ ॥ जो पुराणपुरुष रघुनाथ ॥ तो शोकार्णवीं पडिला ही मात ॥ असंगत दिसतसे ॥६६॥

जो जगद्वंद्य आत्माराम ॥ जो विश्र्वबीजफलांकित द्रुम ॥ तो शोकाकुलित परब्रह्म ॥ पितयालागीं कां जाहला ॥६७॥

विषकंठ आला कीं क्षीरसागरा ॥ उष्णता व्यापिली रोहिणीवरा ॥ पक्षिवर्या त्या खगेंद्रा ॥ सर्पबाधा केवीं जहाली ॥६८॥

चिंतामणी दरिद्रें व्यापिला ॥ कल्पवृक्ष केवीं निष्फळ जाहला ॥ प्रळयाग्नीचे डोळां ॥ अंधत्व केवीं पातलें ॥६९॥

तंव वक्ता दे प्रत्त्युत्तर ॥ श्रोतीं ऐकिजे सादर ॥ पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर ॥ मानवलोकीं अवतरला ॥७०॥

जगद्रुरु देवाधिदेव ॥ दावी मायेचें लाघव ॥ अवतारकारणाची ठेव ॥ लौकिकभाव दाविला ॥७१॥

नट जो जो धरी वेष ॥ त्याची संपादणी करी विशेष ॥ यालागीं जगदात्मा आदिपुरुष ॥ दाखवी आवेश मायेचा ॥७२॥

ऐसी उघडतां शब्दरत्न मांदुस ॥ गुणग्राहक श्रोते पावले संतोष ॥ संदेहरहित निःशेष ॥ जेंवी तम नासे सूर्योदयीं ॥७३॥

कीं वैराग्यें निरसे काम ॥ ज्ञानें वितळे जेवीं भ्रम ॥ जैसा निधानांतूनि परम ॥ दारुण सर्प निघाला ॥७४॥

करितां संशयाचें निरसन ॥ मागें राहिलें अनुसंधान ॥ तरी हे गोष्टीस दूषण ॥ सर्वथाही न ठेवावें ॥७५॥

ग्रासामाजी लागला हरळ ॥ तो काढावया लागेल वेळ ॥ कीं अनध्यायामाजीं रसाळ ॥ वेदाध्ययन राहिलें ॥७६॥

चोरवाटा चुकवावया पूर्ण ॥ अधिक लागला एक दिन ॥ तरी ते गोष्टीतें दूषण ॥ कदा सज्ञान न ठेविती ॥७७॥

रात्रीमाजीं सत्कर्में राहतीं ॥ परी सूर्योदयीं सवेंचि चालतीं ॥ छायेंस पांथिक बैसती ॥ सवेंचि जाती निजमार्गे ॥७८॥

समुद्राचें भरते ओहटें ॥ सवेंच मागुती विशेष दाटे ॥ कीं चपळ तुरंग चपेटे ॥ विसावा घेऊनि मागुती ॥७९॥

तेंवि परिसा पुढील कथार्थं ॥ आठवोनि पिता दशरथ ॥ शोकाकुलित जनकजामात ॥ क्षणएक जाहला ॥८०॥

मग वसिष्ठ म्हणे श्रीरामा ॥ प्रयागाप्रति जाऊनि गुणग्रामा ॥ उत्तरक्रिया करूनि निजधामा ॥ दशरथासी बोळविजे ॥८१॥

कित्येक प्राकृत कवि बोलत ॥ कीं जे पतनीं पडिला दशरथ ॥ परी हे गोष्ट असंमत ॥ बोलतां अनर्थ वाचेसी ॥८२॥

जयाचें नाम घेतां आवडीं ॥ जीव उद्धरले लक्षकोडी ॥ तो आपुला पिता पतनीं पाडी ॥ काळत्रयीं न घडे हें ॥८३॥

असो गयेप्रति येऊन ॥ उत्तरक्रिया सर्व सारून ॥ पिता निजपदी स्थापून ॥ आले परतोन चित्रकूटा ॥८४॥

सकळ ऋषी आणि अयोध्याजन ॥ बैसले श्रीरामासी वेष्टून ॥ मग भरतें घालोनि लोटांगण ॥ कर जोडूनि उभा ठाकला ॥८५॥

म्हणे जयजयाजी पुरुषोत्तमा ॥ मायाचक्रचालका पूर्णब्रह्मा ॥ विरिंचिजनका सुखविश्रामा ॥ मंगलधामा रघुराया ॥८६॥

हे राम करुणासमुद्रा ॥ हे रविकुलभूषणा राघवेंद्रा ॥ सर्वानंदसदना रामचंद्रा ॥ प्रतापरुद्रा जगद्रुरो ॥८७॥

हे राम रावणदर्पहरणा ॥ हे राम भवहृदयमोचना ॥ हे राम अहल्योद्धारणा ॥ मखरक्षणा सीताधवा ॥८८॥

हे राम कौसल्यागर्भरत्ना ॥ हे राम माया अपारश्रममोचना ॥ सनकसनंदमानसरंजना ॥ निरंजना निजरूपा ॥८९॥

दानवकाननवैश्र्वानरा ॥ ममहृदयारविंदभ्रमरा ॥ अज्ञानतिमिरच्छेदक दिवाकरा ॥ समरधीरा सर्वेशा ॥९०॥

हे राम भक्तचातकजलधरा ॥ प्रेमचकोरवेधकचंद्रा ॥ संसारगजच्छेदकमृगेंद्रा ॥ अनंगमोहना अनंगा ॥९१॥

उपवासी मरतां चकोर ॥ त्याचे धांवण्या धांवे चंद्र ॥ कीं अवर्षण पडतां जलधर ॥ चातकालागीं धांवे कां ॥९२॥

कीं चिंताक्रांतासी चिंतामणि ॥ सांपडे पूर्वभाग्येंकरूनि ॥ कीं दरिद्रियाचे अंगणीं ॥ कल्पवृक्ष उगवला ॥९३॥

कीं पतिव्रतेसी प्राणनाथ भेटला ॥ कीं क्षुधितापुढें क्षीराब्धि आला ॥ कीं साधकासी निधि जोडला ॥ आनंद जाहला तैसा आम्हां ॥९४॥

हंसें देखिलें मानससरोवर ॥ कीं प्रेमळा भेटला उमावर ॥ कीं संकल्पीं द्रव्य अपार ॥ दुर्बळ ब्राह्मणासी दीधलें ॥९५॥

तैसा आनंद जाहला जनांसी ॥ आतां सत्वर चलावें अयोध्येसी ॥ सांभाळावें बंधुवा आम्हांसीं ॥ श्रीदशरथाचेनि न्यायें ॥९६॥

आपुलें राज्य सांभाळावें ॥ गोब्राह्मणां प्रतिपाळावें ॥ आमुचे मनोरथ पूर्ण करावे ॥ आतां परतावें सत्वर ॥९७॥

जननी आमुची परम चतुर ॥ मज देत होती राज्यभार ॥ जैसे छेदोनियां शिर ॥ गुडघ्यास पूजा बांधिली ॥९८॥

पूज्यमूर्ति वोसंडून ॥ जैसे गुरवाचे धरी चरण ॥ राजकुमर सांडोन ॥ कन्या दिधली अजारक्षका ॥९९॥

पाडोनि देवळाचें शिखर ॥ घातलें भोंवतें आवार ॥ नागवूनि यात्रा समग्र ॥ अन्नसत्र घातलें ॥१००॥

फणस टाकोनि रसाळ ॥ प्रीतीनें घेतलें कनकफळ ॥ मुक्त सांडोनि तेजाळ ॥ गुंज जैसी घातली ॥१॥

गार घेऊनि टाकिला हिरा ॥ अंधकार घेऊनि त्यजिलें दिनकरा ॥ पाच भिरकावूनि सत्वरा ॥ कांच बळें रक्षिली ॥२॥

परिस त्यागून घेतला खडा ॥ पंडित दवडूनि आणिला वेडा ॥ चिंतामणि टाकोनि रोकडा ॥ पलांडु घेतला बळेंचि ॥३॥

अमृत टाकूनि घेतली कांजी ॥ कल्पवृक्ष तोडोनि लाविली भाजी ॥ कामधेनु दवडोनि सहजीं ॥ अजा पूजी आदरें ॥४॥

निजसुख टाकोनि घेतलें दुःख ॥ कस्तूरी टाकूनि घेतली राख ॥ सोने टाकूनि सुरेख ॥ शेण जैसें घेतलें ॥५॥

सांडोनियां रायकेळें ॥ आदरें भक्षी अर्कींफळें ॥ ज्ञान सांडोनि घेतलें ॥ अज्ञान जाण बळेंचि ॥६॥

तैसें कैकयीनें केलें साचार ॥ वना दवडोनि जगदोद्धार ॥ मज द्यावया राज्यभार ॥ सिद्ध जाहली साक्षेपें ॥७॥

सर्व अपराध करूनि क्षमा ॥ अयोध्येसी चलावें श्रीरामा ॥ याउपरी जगदात्मा ॥ काय बोलिला तं ऐका ॥८॥

सूर्य मार्ग चुके करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावे अग्न ॥ मशकाची धडक लागून ॥ जरी मेरु पडेल ॥९॥

पाषाण प्रहार लागून ॥ वायु पडेल मोडोनि चरण ॥ कीं पिपीलिका शोषी सिंधुजीवन ॥ विजूस धांवूनि मशक धरी ॥११०॥

धडधडीत अग्निज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होय शीतळ ॥ हेंही घडेल एक वेळ ॥ परी वचनास चळ नोहे माझे ॥११॥

एक बाण एक वचन ॥ एकपत्नीव्रत पूर्ण ॥ चौदा वर्षें भरल्याविण ॥ कदापि आगमन घडेना ॥१२॥

ऐसें निश्र्चयाचें वचन ॥ बोलता जाहला रघुनंदन ॥ अग्नीनें आहाळे जैसें सुमन ॥ तैसें भरता जाहलें ॥१३॥

मग भरतें चेतविला जातवेद ॥ प्राण द्यावया जाहला सिद्ध ॥ म्हणे हा देह करीन दग्ध ॥ रामवियोग मज न सोसवे ॥१४॥

महाराज वाल्मीक मुनि ॥ भरतास एकांतीं नेऊनी ॥ मूळकाव्यार्थ अवघा कानीं ॥ भविष्यार्थ सांगितला ॥१५॥

तो ऐकतां कैकयीसुत ॥ उगाच राहिला निवांत ॥ मग येऊनि जनकजामात ॥ हृदयीं धरी भरतातें ॥१६॥

आपुल्या हस्तेंकरून ॥ पुसिले भरताचे नयन ॥ करें कुरवाळिलें वदन ॥ समाधान करीतसे ॥१७॥

देव बंदींचे सोडवून ॥ चौदा वर्षांत येतों परतोन ॥ मग वरदहस्त उचलोन ॥ भाष दीधली भरतातें ॥१८॥

चौदा वर्षें चौदा दिन ॥ पंधरावे दिवशीं पूर्ण ॥ माध्यान्हा येतां चंडकिरण ॥ भेटेन येऊन तुजलागीं ॥१९॥

भरत म्हणे हा नेम टाळतां ॥ मग देह त्यागीन तत्वतां ॥ श्रीरामचरणीं ठेविला माथा ॥ प्रेमावस्था अधिक पैं ॥१२०॥

भरत मागुता उठोन ॥ विलोकी श्रीरामाचें वदन ॥ अमलदलराजीवनयन ॥ तैसाचि हृदयीं रेखिला ॥२१॥

भरत सद्रद बोले वचन ॥ मी अयोध्येसी न जाय परतोन ॥ सकळ मंगळभोग स्नान ॥ त्यजूनि राहीन नंदिग्रामीं ॥२२॥

अवश्य म्हणे रघुनायक ॥ मणिमय पादुका सुरेख ॥ भरतासी दिधल्या शोकहारक ॥ येरें मस्तकीं वंदिल्या ॥२३॥

शिवमस्तकीं विराजे चंद्र ॥ तैशा शिरीं पादुका सुंदर ॥ शोक हारपला समग्र ॥ शरीर शीतळ जाहलें ॥२४॥

जैसें कंठीं धरितां नामस्मरण ॥ शीतळ जाहला पार्वती-रमण ॥ तैसाचि प्रेमळ भरत जाण ॥ अंतरीं पूर्ण निवाला ॥२५॥

शत्रुघ्नासी म्हणे रघुनाथ ॥ तूं आणि प्रधान सुमंत ॥ राज्यभार चालवा समस्त ॥ यथान्यायेंकरूनियां ॥२६॥

सदा स्तवावे संतसज्जन ॥ श्रीगुरुभजनीं सावधान ॥ दूर त्यागावे दुर्जन ॥ त्यांचें अवलोकन न करावें ॥२७॥

परदारा आणि परधन ॥ येथें कदा न ठेविजे मन ॥ वेदमर्यादा नुल्लंघावी पूर्ण ॥ प्राणांतही जाहलिया ॥२८॥

जरी क्लेशकाळ पातला बहुत ॥ परी धैर्य न सोडावें यथार्थ ॥ गुरुभजन पुण्यपंथ ॥ न सोडावे सर्वथा ॥२९॥

साधु संत गोब्राह्मण ॥ त्यांचें सदा करावें पाळण ॥ सकळ दुष्टांस दवडोन ॥ स्वधर्म पूर्ण रक्षावा ॥१३०॥

कथा कीर्तन पुराणश्रवण ॥ काळ क्रमावा येणेंकरून ॥ आपुला वर्णाश्रमधर्म पूर्ण ॥ सर्वथाही न त्यजावा ॥३१॥

संतांचा न करावा मानभंग ॥ हरिभजनीं झिजवावें अंग ॥ सांडोनि सर्व कुमार्ग ॥ सन्मार्गेंचि वर्तावें ॥३२॥

ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ वर्म कोणाचें न बोलावें ॥ विश्र्व अवघें जाणावें ॥ आत्मरूपीं निर्धारें ॥३३॥

सत्संग धरावा आधीं ॥ नायकावी दुर्जनांची बुद्धि ॥ कामक्रोधादिक वादी ॥ दमवावे निजपराक्रमें ॥३४॥

मी जाहलों सज्ञान ॥ हा न धरावा अभिमान ॥ विनोदेंही पराचें छळण ॥ न करावें सहसाही ॥३५॥

शमदमादिक साधनें ॥ स्वीकारावी साधकानें ॥ जन जाती आडवाटेनें ॥ त्यांसी सुमार्ग दाविजे ॥३६॥

शोकमोहांचे चपेटे पूर्ण ॥ आंगीं आदळत येऊन ॥ विवेकवोडण पुढें करून ॥ ज्ञानशस्त्र योजावें ॥३७॥

काम क्रोध मद मत्सर ॥ हे गृहासी येऊं न द्यावे तस्कर ॥ आयुष्य क्षणिक जाणोनि साचार ॥ सारासार विचारावें ॥३८॥

क्षणिक जाणोनि संसार ॥ सोडावा विषयांवरील आदर ॥ सद्रुवचनीं सादर ॥ सदा चित्त ठेविजे ॥३९॥

दैवें आलें भाग्य थोर ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥ एकदांचि जरी गेलें समग्र ॥ कदा धीर न सांडावा ॥१४०॥

कमलपत्राक्ष कृपानिधान ॥ वर्षत स्वातीजल पूर्ण ॥ ते सुमंत आणि शत्रुघ्न ॥ कर्ण शुक्तिकेंत सांठविती ॥४१॥

शब्दामृत वर्षे रामचंद्र ॥ निवाले भरत कर्णचकोर ॥ कीं रामवचन क्षीरसागर ॥ उपमन्यु भरत साचार तेथें ॥४२॥

सूर्य उगवतां निरसे तमजाळ ॥ तैसें श्रीरामवचनें जाहलें हृदय निर्मळ ॥ मग भरत परतोनि तात्काळ ॥ नंदिग्रामीं राहिला ॥४३॥

करूनि मातेचे समाधान ॥ सकळ ब्राह्मण प्रजाजन ॥ सुमंत आणि शत्रुघ्न ॥ पाठवी परतोनि अयोध्ये ॥४४॥

श्रीरामपादुका सिंहासनीं ॥ शत्रुघ्नें वरी छत्र धरूनि ॥ मग राज्य चालवी अनुदिनीं ॥ नामस्मरणें सावध ॥४५॥

क्षणक्षणां येत नंदीग्रामासी ॥ मागुता जाय अयोध्येसी ॥ सकळ पृथ्वीच्या राजांसी ॥ धाक भरत शत्रुघ्नांचा ॥४६॥

प्रतिसंवत्सरीं करभार ॥ भूपाळ देती समग्र ॥ असो नंदिग्रामीं भरतवीर ॥ निर्विकार बैसला ॥४७॥

नंदिग्रामाजवळ अरण्यांत ॥ पर्णकुटी करून राहे भरत ॥ श्रीरामपादुका विराजित ॥ रात्रंदिवस मस्तकीं ॥४८॥

जे आवडते श्रीरामभक्त ॥ तेही भरताऐसे विरक्त ॥ कनक कामिनी गृह सुत ॥ त्याग करूनि बैसले ॥४९॥

वटदुग्धीं जटा वळूनि ॥ सकळ मंगळभोग त्यजोनि ॥ वल्कलें वेष्टित तृणासनीं ॥ बैसले ध्यानीं श्रीरामाचे ॥१५०॥

नक्षत्रांत जैसा चंद्र ॥ तैसा मध्यें भरत साचार ॥ रात्रंदिवस रामचरित्र ॥ भरत सांगे समस्तांतें ॥५१॥

किंवा मानससरोवरीं ॥ बैसती राजहंसाच्या हारी ॥ भरतास भोंवतें तेचिपरी ॥ वेष्टूनियां बैसले ॥५२॥

श्रीधर म्हणे श्रोतयां समस्तां ॥ चित्त द्यावें पुढील श्र्लोकार्था ॥ रघुनाथ चित्रकुटीं असतां ॥ काय कथा वर्तली ॥५३॥

कवीची शब्दरत्नमांदुस ॥ उघडितां पंडित पावती संतोष ॥ इतर कुबुद्धि मतिमंदास ॥ रत्नपरीक्षा नकळे हो ॥५४॥

असो चित्रकूटीं असतां रघुनंदन ॥ मिळोनि बहिर्मूख ब्राह्मण ॥ म्हणती रामा तूं जाईं येथून आम्हांसी विघ्नें तुझेनि ॥५५॥

तुझी स्त्री परम सुंदर ॥ न्यावया जपती बहुत असुर ॥ वाल्मीकभविष्य साचार ॥ ऐसेंचि असे जाण पां ॥५६॥

वनींहूनि वार्ता उठली साचार ॥ त्रिशिरा दूषण आणि खर ॥ दळभारेंसीं येथे येणार ॥ तुजकरितां रघुवीरा ॥५७॥

म्हणोनि सांगतों तुजसी ॥ येथोनि जाईं निश्र्चयेसीं ॥ नाहींतरी आम्हीं स्वाश्रमासी ॥ त्यजोनि जाऊं निर्धारें ॥५८॥

श्रीराम म्हणे ब्राह्मणांलागुनी ॥ तुम्हीं निश्र्चिंत असावें अंतःकरणीं ॥ काळही फोडीन समरंगणीं ॥ राक्षसांतें गणी कोण ॥५९॥

परम अविश्र्वासी ब्राह्मण ॥ म्हणती विघ्नें येती दारुण ॥ हा आपले स्त्रीस रक्षील जाण ॥ कीं आम्हांसी रक्षील ॥१६०॥

हा त्यांसीं न पुरे समरंगणीं ॥ चारी बाण जाती सरूनि ॥ याच्या बोलाचा विश्र्वास धरूनि कदां येथें न राहावें ॥६१॥

मग सकळीं करूनि एकविचार ॥ रात्रीचे उठोनियां समग्र ॥ कुटुंबें घेऊनि सत्वर ॥ गेले विप्र पळोनियां ॥६२॥

उपरी प्रातःकाळीं उठोन ॥ श्रीराम पाहे ऋषिजन ॥ तंव ते रात्रींच गेले पळोन ॥ राजीवनयन काय करी ॥६३॥

एक वाल्मीक उरला पूर्ण ॥ तो महाराज तपोधन ॥ भूत भविष्य वर्तमान ॥ त्रिकालज्ञान जयासी ॥६४॥

वायुसंगें उडे तृण ॥ परी अचळ न सोडी स्थान ॥ किंवा रणमंडळ सोडून ॥ रणशूर कदा पळेना ॥६५॥

तैसा वाल्मीक उरला जाण ॥ तेणें आधींच कथिलें रामायण ॥ इतर बहिर्मूख ब्राह्मण ॥ श्रीराम निधान नोळखती ॥६६॥

प्रत्यया न येतां रघुवीर ॥ आचार तितका अनाचार ॥ कर्म तोच भ्रम थोर ॥ पिशाच नर तेचि पैं ॥६७॥

तणें केलें वेदपठण ॥ करतलामलक शास्त्रें प्रमाण ॥ परी तें मद्यपीयाचें भाषण ॥ राघवा शरण न जातां ॥६८॥

जैसी मुग्धा बत्तीसलक्षणीं ॥ परम सौंदर्य लावण्यखाणी ॥ परी मन नाहीं पतिभजनीं ॥ तरी तें सर्वही वृथा गेलें ॥६९॥

खरपृष्ठीस चंदन देख ॥ परी तो नेणें सुवाससुख । षड्रसीं फिरवी जे दर्वी पाक ॥ रसस्वाद नेणें ती ॥१७०॥

कृपा न करितां सीतावर ॥ कासया व्यर्थ तत्त्वविचार ॥ त्याचें ज्ञान नव्हे साचार ॥ जैसे कीर अनुवादती ॥७१॥

तेणें केले तीर्थाटण ॥ होय चौसष्ट कळाप्रवीण ॥ तेणें केलें जरी कीर्तन ॥ तें जाण गायन गौरियाचें ॥७२॥

असो रघुपतीस सांडोनि विप्र ॥ पळोन गेले समग्र ॥ जदद्वंद्य रघुवीर ॥ त्याचें स्वरूप नेणोनियां ॥७३॥

असो आतां बहु भाषण ॥ श्रीराम चित्रकुट त्यागोन ॥ वाल्मीकऋषीस नमून ॥ दंडकारण्या चालिला ॥७४॥

श्रीरामविजय ग्रंथ प्रचंड ॥ येथें संपलें अयोध्याकांड ॥ आतां अरण्यकांड इक्षुदंड ॥ अति अपूर्व सुरस पुढें ॥७५॥

रामविजय ग्रंथ क्षीरसागर ॥ दृष्टांतरत्नें निघती अपार ॥ संत श्रोते निर्जर ॥ अंगीकरोत सर्वदा ॥७६॥

ब्रह्मानंदा रविकुलभूषणा ॥ श्रीधरवरदा सीताजीवना ॥ पुढें अरण्यकांडरचना ॥ बोलवीं आतां येथोनि ॥७७॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वादशोध्याय गोड हा ॥१७८॥

॥ अध्याय ॥ १२ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

श्रीरामविजयअध्याय १३ वा

श्री गणेशाय नमः श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः

संस्कृतापासोनि केवळ ॥ झाली प्राकृत भाषा रसाळ ॥ कीं स्वातीजळापासोनि मुक्ताफळ ॥ अतितेजाळ निपजे पैं ॥१॥

चंद्राचे अंगीं निपजे चांदणें ॥ कीं दिनकरापासाव जेवीं किरणें ॥ कीं जंबुनदापासाव सोनें ॥ बावनकसी निपजे पैं ॥२॥कीं दुग्धापासोनि नवनीत ॥ कीं अभ्यासापासोनि मति अद्भुत ॥ कीं इक्षुदंडापासोनि निपजत ॥ रसभरित शर्करा ॥३॥

कीं पुष्पापासोनि परिमळ ॥ कीं रंभेपासोनि कर्पूर शीतळ ॥ मृगापासोनि परिमळ ॥ मृगमद जेवीं निपजें पैं ॥४॥

कथालक्षण सरितानाथ ॥ साहित्यतरंग अपरिमित ॥ प्रेमळ लहरिया अद्भुत ॥ ऐक्या येत परस्परें ॥५॥

अमृताहून गोड अन्न ॥ परि रुचि नये शाकेविण ॥ दृष्टांताविण ग्रंथ संपूर्ण ॥ रसीं न चढे सर्वथा ॥६॥

रत्नखाणी मेरुपाठारीं ॥ तैसें दृष्टांत कथांमाझारीं ॥ कमलावांचोनि सरोंवरीं ॥ शोभा नये सर्वथा ॥७॥

अलंकारें शोभे नितंबिनी ॥ कीं गगन मंडित उडुगणीं ॥ कीं मानससरोवरा हंसांवांचोनी ॥ शोभा नयेचि सर्वथा ॥८॥

कीं मननाविण श्रवण ॥ कीं सद्भावाविण कीर्तन ॥ कीं क्षेत्र जैसे बीजाविण ॥ दृष्टांतांविण ग्रंथ तैसा ॥९॥

कीं सभा जैसी पंडितांविण ॥ कीं सुस्वराविण गायन ॥ कीं शुचीविण तपाचरण ॥ दृष्टांतांविण ग्रंथ तैसा ॥१०॥

कीं विरक्तीविण ज्ञान ॥ की प्रेमाविण व्यर्थ भजन ॥ कीं दानाविण भाग्य पूर्ण ॥ दृष्टांताविण ग्रंथं तैसा ॥११॥

अरण्यकांड अरण्यांत ॥ दृष्टांतवृक्ष विराजत ॥ तेथें आनंदफळें पंडित ॥ सदा सेवोत स्वानंदें ॥१२॥

आतां अरण्यकांड वसंतवन ॥ तेथें वाग्देवी चिच्छक्ति पूर्ण ॥ क्रीडा करी उल्हासेंकरून ॥ संतसज्जन परिसा तें ॥१३॥

असो चित्रकूटाहूनि अयोध्यानाथ ॥ सीतासौमित्रांसमवेत ॥ निजभक्तांसी उद्धरित ॥ जगन्नाथ जातसे ॥१४॥

दक्षिणपंथें जनकजामात ॥ सकळ ऋषींच आश्रम पहात ॥ त्रयोदश वर्षेंपर्यंत ॥ रघुनाथ क्रमित ऐसेंचि ॥१५॥

कोठें वर्ष कोठें अयन ॥ कोठें मास कोठें पक्ष पूर्ण ॥ कोठें एक रात्र पक्ष त्रिदिन ॥ कोठें पंच रात्री क्रमियेल्या ॥१६॥

मग अत्रीचिया आश्रमाप्रांति ॥ येता झाला जनकजापती ॥ तों देखिली दत्तात्रेयमूर्ति ॥ अविनाशस्थिति जयाचि ॥१७॥

सह्याद्रीवरी श्रीराम ॥ अजअजित मेघश्याम ॥ श्रीदत्तात्रेय पूर्ण ब्रह्म ॥ देत क्षेम तयातें ॥१८॥

क्षीरसागरींच्या लहरिया ॥ परस्परें समरसोनियां ॥ कीं जान्हवी आणि मित्रतनया ॥ एके ठायीं मिळताती ॥१९॥

कीं नानावर्ण गाई ॥ परी दुग्धास दुजा वर्ण नाहीं ॥ तैसा जनकाचा जांवई ॥ आणि अत्रितनय मिसळले ॥२०॥

अवतारही उदंड होती ॥ सर्वेचि मागुती विलया जाती ॥ तैसी नव्हे श्रीदत्तात्रेयमूर्ति ॥ नाश कल्प ती असेना ॥२१॥

पूर्णब्रह्म मुसावलें ॥ तें हें दत्तात्रेयरूप ओतिलें ॥ ज्याचे विलोकनमात्रें तरले ॥ जीव अपार त्रिभुवनीं ॥२२॥

सकळ सिद्ध ऋषी निर्जर ॥ विधि वाचस्पती शचीवर ॥ दत्तात्रयदर्शना साचार ॥ त्रिकाळ येती निजभावें ॥२३॥

अद्यापि सह्याद्रीपर्वतीं ॥ देवांचे भार उतरती ॥ सर्व ब्रह्मांडींचीं दैवतें धांवती ॥ अवधूतमूर्ति पहावया ॥२४॥

घेतां दत्तात्रयदर्शन ॥ देवांसी सामर्थ्य चढे पूर्ण ॥ मग ते इतरांसी होती प्रसन्न ॥ वरदान द्यावयातें ॥२५॥

ज्यासी प्रयागीं प्रातःस्नान ॥ पांचाळेश्र्वरीं अनुष्ठान ॥ करवीरपुरांत येऊन ॥ भिक्षाटण माध्यान्हीं ॥२६॥

अस्ता जातां वासरमणि ॥ सह्याद्रीस जाती परतोनी ॥ तो देवांचे भार कर जोडोनी ॥ वाट पहाती अगोदर ॥२७॥

दुष्टी देखतां दिगंबर ॥ एकचि होय जयजयकार ॥ असंख्य वाद्यांचे गजर ॥ अद्यापि भक्त ऐकती ॥२८॥

दत्तात्रेयभक्त देखतां दृष्टीं ॥ सकळ दैवतें जीं जीं सृष्टी ॥ त्याचे पाय घालिती मिठी ॥ पुढें ठाकती कर जोडूनि ॥२९॥

करितां दत्तात्रेयस्मरण ॥ भूतप्रेतें पळतीं उठोन ॥ मग उपासकांसी विघ्न ॥ कवण करूं शकेल ॥३०॥

असो ऐसा स्वामी अवधूत ॥ जो अत्रीचा महापुण्यपर्वत ॥ तयास वंदोनि रघुनाथ ॥ अत्रिदर्शन घेतसे ॥३१॥

तंव ते अनसूया सती ॥ सीता राम तियेसी वंदिती ॥ सीतेसी आलिंगूनि प्रीतीं ॥ वर देती जाहली ॥३२॥

आपुले निढळीचें कुंकुम काढिलें ॥ तें सीतेचे कपाळीं लाविलें ॥ अमलवस्त्र नेसविलें ॥ जे न मळे न विटे कल्पांतीं ॥३३॥

गळां घातला सुमनहार ॥ जो कधीं न सुके साचार ॥ जैसा नित्य नूतन दिनकर ॥ तेज अणुमात्र ढळेना ॥३४॥

सीतेचें सुवास शरीर ॥ अनसूया करी निरंतर ॥ ज्या सुवासें अंबर ॥ परिपूर्ण होय पैं ॥३५॥

भेटतां राक्षस दुर्धर ॥ सीतेसी भय न वाटे अणुमात्र ॥ ऐसा दिधला निर्भय वर ॥ अनसूयेनें तेधवां ॥३६॥

सवेंचि रेणुकेचें दर्शन ॥ घेत रविकुळभूषण ॥ जिच्या वरें भार्गवें पूर्ण ॥ निःक्षत्री केली धरित्री ॥३७॥

ते मूळपीठनिवासिनी शक्ति ॥ तीस वंदी अयोध्यापति ॥ ते श्रीरामाची मूळप्रकृती ॥ आदिमाया निर्धारें ॥३८॥

ते प्रथमअवताराची जननी ॥ तीच कौसल्या झाली दुसरेनि ॥ श्रीराम स्तवी म्हणोनी ॥ ऐका श्रवणीं सादर ॥३९॥

जयजय आदिकुमारिके ॥ जयजय मूळपीठनायिके ॥ सकळ कल्याणसौभाग्यदायिके ॥ जगदंबिके मूळप्रकृति ॥४०॥

जयजय भार्गवप्रियभवानी ॥ भवनाशके भक्तवरदायिनी ॥ सुभद्रकारके हिमनगनंदिनी ॥ त्रिपुरसुंदरी महामाये ॥४१॥

जयजय आनंदकासारमराळिके ॥ जयजय चातुर्यचंपककळिके ॥ जयजय शुंभनिशुंभदैत्यांतके ॥ सर्वव्यापके मृडानी ॥४२॥

जयजय शिवमानसकनकलतिके ॥ पद्मनयने दुरितवनपावके ॥ जयजय त्रिविधतापमोचके ॥ निजजनपालके अन्नपूर्णें ॥४३॥

तव मुखकमलशोभा देखोनी ॥ इंदुबिंब गेलें विरोनी ॥ ब्रह्मादिकें बाळें तिन्हीं ॥ स्वानंदसदनीं निजविसी ॥४४॥

जीव शिव दोनी बाळकें ॥ अंबे तुवां निर्मिलीं कौतुकें ॥ जीव तुझें स्वरूप नोळखे ॥ म्हणोनि पडिला आवर्तीं ॥४५॥

शिव तुझे स्मरणीं सावचित्त ॥ म्हणोनि तो नित्यमुक्त ॥ ब्रह्मानंद पद हातां येत ॥ तुझे कृपेनें जननीय ॥४६॥

मेळवूनि पंचभूतांचा मेळ ॥ तुवां रचिला ब्रह्मांडगोळ ॥ इच्छा परततां तत्काळ ॥ क्षणांत निर्मूळ करिसी तूं ॥४७॥

ऐसें स्तवोनि चापपाणि ॥ सह्याद्रीवरी दिनत्रय क्रमोनि ॥ अत्रिऋृषीची आज्ञा घेऊनि ॥ दक्षिणपंथे चालिले ॥४८॥

अत्रि म्हणे गा रघुपति ॥ या वनीं राक्षस बहु वसती ॥ जतन करी सीता सती ॥ क्षणही परती न कीजे ॥४९॥

अवश्य म्हणोनि जलजनेत्र ॥ पुढें चालिला स्मरारिमित्र ॥ पाठीसी भोगींद्रअवतार ॥ वीर सौमित्र जातसे ॥५०॥

 

त्यामागें मंगळभगिनी ॥ मंगळकारक विश्र्वजननी ॥ स्थिर स्थिर हंसगमनी ॥ मंगळजननीवरी चाले ॥५१॥

दुरावतां भूमिकन्या ॥ सौमित्र म्हणे राजीवनयना ॥ जानकी मागें राहिली मनमोहना ॥ उभा राहें क्षणभरी ॥५२॥

वचन ऐकतां जगन्नायक ॥ उभा राहिला क्षण एक ॥ परम उदार सुहास्यमुख ॥ परतोनि पाहे सीतेकडे ॥५३॥

तंव ते सुकुमार जनकबाळी ॥ हळूहळू आली जवळी ॥ जेंवी सारासार विचार नेहाळी ॥ आत्मसुखाची पाविजे ॥५४॥

असो ते पतिव्रतामंडन ॥ विलोकी श्रीरामाचें वदन ॥ जयावरून कोटी मदन ॥ ओंवाळून टाकावे ॥५५॥

परम सलज्ज होऊन ॥ केलें किंचित हास्यवदन ॥ जेणें निवती राघवकर्ण ॥ ऐसें वचन बोलली ॥५६॥

म्हणे जगद्वंद्या रविकुळभूषणा ॥ विषकंठहृदयाचिन्मयलोचना ॥ चरणीं चालतां रघुनंदना ॥ बहुत श्रम पावलेती ॥५७॥

परम सुकुमार लक्ष्मण ॥ चरणीं पावला शीण ॥ वृक्षच्छायेसि जाऊन ॥ गुणसागरा बैसावें ॥५८॥

रातोत्पल सुकुमार ॥ त्याहूनि पदें तुमची अरुवार ॥ अरुणसंध्यारागमित्र ॥ चरणतळवे सुरवाडले ॥५९॥

जें जान्हवीचें जन्मस्थान ॥ तें मी निजकेशीं झाडीन ॥ शीतोदकें धुवोन ॥ मग चुरीन क्षणभरी ॥६०॥

आजिचें पेणें किती दूर ॥ आहे तें नकळे साचार ॥ ऐकतां पद्माक्षीचें उत्तर ॥ द्रवला रघुवीर अंतरीं ॥६१॥

म्हणे सुकुमार चंपककळी ॥ चरणीं चालतां बहु श्रमली ॥ ऐसें बोलतां नेत्रकमळीं ॥ अश्रु आले राघवाचे ॥६२॥

मग आपुलें हस्तें करून ॥ कुरवाळिलें सीतेचें वदन ॥ मस्तकीं हस्त ठेवून ॥ श्रम संपूर्ण हरियेला ॥६३॥

परम सुखावली जनकनंदिनी ॥ श्रीरामाचीं पदें झाडूनि ॥ मग आपुल्या मुक्तकेशेंकरूनि ॥ प्रक्षाळूनि चरण चुरीतसे ॥६४॥

मग उठोनि चालिला रघुवीर ॥ पाठीसी उभा भूधरावतार ॥ त्याचेमागें जनकजा सुंदर ॥ हंसगती चमकतसे ॥६५॥

वनचरें वैरभाव सांडोनि ॥ होतीं ते पळतीं भयेंकरूनि ॥ विराध राक्षस ते क्षणीं ॥ आला धांवूनि अकस्मात ॥६६॥

महाभयानक विशाळ शरीर ॥ खदिरांगार तैसे नेत्र ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी मोकळिया ॥६७॥

जैसा अग्नीचा ओघ थोर ॥ तैसी जिव्हा लवलवित बाहेर ॥ काजळाचा पर्वत थोर ॥ तैसें शरीर दिसतसे ॥६८॥

गळा नरमुंडांच्या माळा ॥ हातीं शूल ऊर्ध्व धरिला ॥ सिंहगजवनचरांचा मेळा ॥ टोंचिल्या माळा शूलावरी ॥६९॥

शतांचे शत ब्राह्मण ॥ रगडी दाढेखालीं घालून ॥ वाटेंसी लत्ताप्रहारेंकरूनी ॥ वृक्ष पाडी समूळीं ॥७०॥

पुढें जातसे रघुनाथ ॥ मागोनि विराध आला धांवत ॥ जानकी धरूनि अकस्मात ॥ जात झाला ते वेळीं ॥७१॥

जैसा गृहीं तस्कर रिघोनी ॥ धनकुंभ जाय घेऊनि ॥ कीं अकस्मात व्याघ्र येऊनि ॥ नेत उचलानि हरिणीतें ॥७२॥

कीं होमशाळेंत रिघे श्र्वान ॥ जाय चरुपात्र घेऊन ॥ तैसा विराध दुर्जन ॥ जात वेगेंकरूनियां ॥७३॥

करुणास्वरें करूनि देखा ॥ जानकी म्हणे मित्रकुळटिळका ॥ धांव धांव अयोध्यानायका ॥ जगव्यापका दीनबंधु ॥७४॥

परतोनि पाहे राजीवाक्ष ॥ तों सघन लागले वनीं वृक्ष ॥ नयनीं न दिसे प्रत्यक्ष ॥ कोणीकडे गेला तो ॥७५॥

क्षण न लागतां लक्ष्मण ॥ धनुष्यासी योजिला अर्धचंद्र बाण ॥ तत्काळ वृक्ष छेदून ॥ केलें वन निर्मूळ ॥७६॥

धनुष्य चढवोनि जनकजामातें ॥ पाचारिलें तेव्हां विरोधातें ॥ जैसा मृगेंद्र महागजातें ॥ तैसी लक्ष्मणें हांक फोडली ॥७७॥

अरे राक्षसा धरीं धीर ॥ माझा बाण घटोद्भव थोर ॥ तुझे आयुष्यसागराचें नीर ॥ प्राशील आतां निर्धारें ॥७८॥

महाव्याघ्राचा विभाग देख ॥ कैसा नेऊन वांचेल जंबुक ॥ आदित्याच्या कळा मशक ॥ तोडील कैसा निजांगें ॥७९॥

काळाचें हातींचा दंड अभंग ॥ केविं नेऊं शके झोटिंग ॥ वासुकीचा विषदंत सवेग ॥ दुर्दुर केवीं पाडीं पां ॥८०॥

विराध म्हणे तूं मानव धीट ॥ गोष्टी सांगतोसी अचाट ॥ तरी तुझें करीन पिष्ट ॥ मुष्टिघातें आतांचि ॥८१॥

ऐसें राक्षस बोलून ॥ जानकीस खालीं ठेवून ॥ धाविन्नला पसरूनि वदन ॥ रामसौमित्रांवरी तेधवां ॥८२॥

करीं धांवत्या वायूंचें खंडण ॥ ऐसें रामें सोडिले दोन बाण ॥ त्यांहीं दोनी भुजा उडवून ॥ गेले घेवोन निराळपंथें ॥८३॥

सवेंचि सूर्यमुखशरें ॥ शीर छेदिलें कौसल्याकुमरें ॥ विमानीं देव जयजयकारें ॥ पुष्पसंभार वर्षती ॥८४॥

विराध पावला दिव्य शरीर ॥ रामासी विनवी जोडूनि कर ॥ म्हणे मी गंधर्व तुंबर ॥ नाम माझें रघुवीरा ॥८५॥

गायन करावया वहिलें ॥ यक्षपतीनें बोलाविलें ॥ तंव म्यां मद्यपान केलें ॥ भ्रांत झालें शरीर माझें ॥८६॥

कंठीं न उमटतां स्वर ॥ मग कुबेरें सोडिलें शापशस्त्र ॥ म्हणे तूं होय निशाचर ॥ महाघोर वनांतरीं ॥८७॥

मग म्यां करुणा भाकितां थोर ॥ उच्छाप बोलिला कुबेर ॥ तुज वनीं वधील रघुवीर ॥ तैं उद्धार होय तुझा ॥८८॥

राघवा वर्षें दहा सहस्र ॥ मी विचरें येथें रजनीवर ॥ माझ्या भेणें दशशिर ॥ चळचळां थोर कांपतसे ॥८९॥

असो माझा उद्धार झाला येथ ॥ म्हणोनि वंदिलें रघुनाथातें ॥ विमानीं बैसोनि त्वरितें ॥ स्वस्थानासी पावला ॥९०॥

विराध रामें मारितां वनीं ॥ चहूंकडे पसरली कीर्तिध्वनी ॥ जैसे तैल पडतां जीवनीं ॥ जाय पसरोनि क्षणार्धें ॥९१॥

कीं सुपुत्रीं दान देतां निर्मळ ॥ कीर्तीनें भरे भूमंडळ ॥ कीं दुर्जनासी गुह्य केवळ ॥ सांगतां पसरे चहूंकडे ॥९२॥

कीं कुलवंतासी उपकार ॥ करितां कीर्ति वाढे सविस्तर ॥ कीं संतसमागमें अपार ॥ दिव्य ज्ञान प्रगटे पैं ॥९३॥

असो जानकी सप्रेम येऊन ॥ वंदी श्रीरामाचे चरण ॥ म्हणे तुमचा पराक्रम आणि संधान ॥ आजि म्यां दृष्टीं पाहिलें ॥९४॥

विराध उद्धरूनि जातां ॥ तेणें प्रार्थिलें रघुनाथा ॥ स्वामी तव दर्शनीं आस्था ॥ शरभंगऋृषीनें धरिली असे ॥९५॥

हंसविमान घेऊनि इंद्र ॥ त्यासी मूळ आला साचार ॥ परी तुज पाहिल्याविण मुनीश्र्वर ॥ नवजायचि ब्रह्मपदा ॥९६॥

केव्हां उगवेल रोहिणीवर ॥ म्हणोनि इच्छिती चकोर ॥ तैसा दृष्टीं पहावया रामचंद्र ॥ शरभंग ऋृषि इच्छितसे ॥९७॥

ऐसें विराधें सांगून ॥ मग तो गेला उद्धरून ॥ त्याचे आश्रमासी रघुनंदन ॥ जाता झाला ते काळीं ॥९८॥

मग पुढें जात रघुनंदन ॥ मागें येत जानकी चिद्रत्न ॥ तिचे पाठिसीं लक्ष्मण ॥ चहूंकडे पहातसे ॥९९॥

आणीक येतील रजनीचर ॥ म्हणोनि चापासी लाविला शर ॥ बळिया सुमित्राकुमर ॥ पाठिराखा येतसे ॥१००॥

तों वृक्षच्छायेसी क्षणक्षणां ॥ ठायीं ठायीं बैसे पद्मनयना ॥ श्र्वास टाकोनि म्हणे लक्ष्मणा ॥ कांहो राहाना आजि कोठें ॥१॥

तों वृक्षातळीं सर्वसाक्षी ॥ जो चराचरचित्तपरीक्षी ॥ पद्माक्षीचा मार्ग लक्षी ॥ उभा राहूनि क्षणैक ॥२॥

पुढें शरभंगाच्या आश्रमा रघुवीर ॥ येता झाला दयासागर ॥ चहूंकडोन धांवले ऋषीश्र्वर ॥ जैसे पूर गंगेचे ॥३॥

सांडोनि समाधि तपाचरण ॥ लगबगां धांवती ब्राह्मण ॥ शरभंग निघे वेगेंकरून ॥ रामदर्शना ते काळीं ॥४॥

शरभंग महाऋषी ॥ परी गलितकुष्ठ भरला त्यासी ॥ दिव्य शरीर धरूनि भेटीसी ॥ येता झाला श्रीरामाचे ॥५॥

पहिलें शरीर झांकून ॥ घरीं ठेवी तो ब्राह्मण ॥ क्षणभरी दिव्य रूप धरून ॥ रामदर्शना पातला ॥६॥

असो देखोन ऋषीश्र्वरांचे भार ॥ साष्टांग नमित रामसौमित्र ॥ शरभंगासहित विप्र ॥ राघवेंद्रें आलिंगिले ॥७॥

शरभंगाच्या आश्रमांत ॥ राहते झाले रघुनाथ ॥ सीतासौमित्रसमवेत ॥ राम पूजिला शरभंगें ॥८॥

लक्ष्मण ऋषीतें पुसत ॥ कंथेखालीं काय कांपत ॥ शरभंग उघडोनि दावित ॥ सौमित्रातें तेधवां ॥९॥

म्हणे हें कर्मशरीर भोगिल्याविण ॥ न तुटे कदा देहबंधन ॥ राजा रंक हो साधु सज्ञान ॥ कर्म गहन सोडीना ॥११०॥

चिळस उपजली लक्ष्मणा ॥ म्हणे वर मागा जी रघुनंदना ॥ ऋषि म्हणे उष्णोदकस्नाना ॥ मज ते न मिळे सर्वथा ॥११॥

शीतोदकें स्नान नित्य ॥ तेणें शरीर हें उलत ॥ ऐसें ऐकोनि अवनिजाकांत ॥ काय बोले ऋृषीतें ॥१२॥

असो तुम्हांसी उदक होऊन ॥ प्रातःकाळीं करूं गमन ॥ तों रात्रि संपतां चंडकिरण ॥ उदयाचळीं उगवला ॥१३॥

ऋषिआज्ञा घेऊनि त्वरित ॥ पुढें चालिला रघुनाथ ॥ ऋषिवचनाचा विसर पडत ॥ श्रीराम येत गौतमीतीरा ॥१४॥

गौतमींत करिता स्नान ॥ तों आठवलें ऋषीचें वचन ॥ मग धनुष्यासि लावून अग्निबाण ॥ सोडिला क्षण न लागतां ॥१५॥

चपळऐसा बाण आला ॥ ऋषिआश्रमापुढें कूप केला ॥ बाण प्रवेशला पाताळा ॥ कूप उचंबळला उष्णोदकें ॥१६॥

तेथें एकेचि स्नानें साचार ॥ ऋषीचें झाले दिव्य शरीर ॥ मग विमानीं बैसवूनि विप्र ॥ शक्रें नेला अमरलोका ॥१७॥

मग सुतीक्षणाच्या आश्रमाप्रति ॥ जाता झाला जनकजापती ॥ मार्गीं तापसी बहुत मिळती ॥ श्रीरामाच्या समागमें ॥१८॥

नाना प्रकारचे तापसी ॥ कित्येक ते वृक्षाग्रवासी ॥ एक वृद्ध अत्यंत वाचेसी ॥ शब्द न फुटे बोलतां ॥१९॥

एक दंतहीन बहुसाल ॥ फळें ठेंचावया कांखेसी उखळ ॥ नग्न मौनी जटाधारी सकळ ॥ दुग्धाहारी फळहारी ॥१२०॥

असो सुतीक्ष्णआश्रमासी ॥ आला शरयूतीरनिवासी ॥ मग परमानंद होत ऋषींसी ॥ रघुपतीसी भेटती ॥२१॥

तेथें क्रमोनि तीन दिन ॥ त्रिनयनहृदयजीवन ॥ त्रिभुवनपति रघुनंदन ॥ पुढें तेथोनि चालिला ॥२२॥

तों गौतमीतीर पावन ॥ पाहतां पांचाळेश्र्वर रम्य स्थान ॥ तेथें भूमींतून गायन ॥ रामचंद्रें ऐकिलें ॥२३॥

रघुत्तमातें सांगती तापसी ॥ येथें मंदकर्ण महाऋषी ॥ परम तपिया तेजोराशि ॥ जैसा आकाशीं भास्कर ॥२४॥

क्षय करावया तपातें ॥ पांच अप्सरा अमरनाथें ॥ पाठवितां ऋषी त्यांतें ॥ देखोनियां भाळला ॥२५॥

भूगर्भविवर कोरून ॥ त्यांचें सर्वदा ऐके गायन ॥ त्याकरितां उर्वींमधून ॥ ध्वनी उमटती राघवा ॥२६॥

असो ऋषि पाह ज्ञानीं ॥ श्रीराम आला कळलें मनीं ॥ मग विवरद्वार उघडोनि ॥ बाहेर आला भेटावया ॥२७॥

रामें वंदिले ऋषीचे चरण ॥ आदरें भेटले दोघेजण ॥ मग आश्रमातें नेऊन ॥ मित्रकुळभूषणा पूजिलें ॥२८॥

तेथें क्रमोनि एक रात्र ॥ पुढें चालिला मदनारिमित्र ॥ नवमेघरंग रघुवीर ॥ सुतीक्ष्णआश्रमा पावला ॥२९॥

मग अगस्तीचें दर्शन ॥ घ्यावया उदित रघुनंदन ॥ तों महाऋषि सुतीक्ष्ण ॥ पुरुषार्थ सांगे अगस्तीचा ॥१३०॥

आतापी वातापी इल्वल ॥ तिघे दैत्य परम सबळ ॥ शिववरें महाखळ ॥ कापट्य सकळ जाणती ॥३१॥

अन्नरूप होय एक ॥ दुजा निजांगें होय उदक ॥ एक अन्नदाता देख ॥ होऊनि बैसले वनांतरीं ॥३२॥

आतापी अन्नदाता पूर्ण ॥ प्रार्थूनि आणी ब्राह्मण ॥ पूजा करूनि उदकपान आदरेंसी समर्पिती ॥३३॥

मग आतापी बाहे नाम घेऊन ॥ वातापी इल्वल दोघेजण ॥ मग ते विप्राचें पोट फोडून ॥ येती धांवून बाहेरी ॥३४॥

ऐसे असंख्यात द्विजगण ॥ भक्षिलें तिहीं मारून ॥ मग कलशोद्भवासी शरण ॥ सकळ ब्राह्मण गेलें पैं ॥३५॥

मग तो महाराज घटोद्भव ॥ जयासी शरण स्वर्गींचे देव ॥ ऋषिकैवारी करुणार्णव ॥ दैत्यस्थाना पातला ॥३६॥

तंव तो धरी अगस्तीचे चरण ॥ म्हणे आश्रम करा जी पावन ॥ अन्न अथवा फळ सेवून ॥ शीतळ जीवन प्राशिजे ॥३७॥

मुखीं सदा वेदाध्ययन ॥ पाठीसी सदा धनुष्यबाण ॥ तंव आतापी ब्राह्मण ॥ कापट्यवेषें पातला ॥३८॥

शुभ्र धोत्रे यज्ञोपवीत ॥ टिळे कुशमुद्रा मिरवत ॥ धोत्रें ओलीं सरसावित ॥ क्षमा बहुत धरिलीसे ॥३९॥

लटिकाचि दावी आचार ॥ परी अंतरीं दुराचार ॥ वृंदावनफळ सुंदर ॥ अंतरीं काळकूट भरलेंसे ॥१४०॥

कीं वरीच जेवीं जारिण ॥ दावी भ्रतारसेवा करून ॥ कीं शठमित्राचें लक्षण ॥ आरंभीं वचन गोड पैं ॥४१॥

कीं बचनाग मुखीं घालितां ॥ प्रथम गोड वाटे तत्वतां ॥ कीं साव चोर गांवीं असतां ॥ बहुत स्नेह वाढवी ॥४२॥

कीं विषकुंभ भरला समस्त ॥ वरी अमृत घातलें किंचित ॥ कीं दांभिक शिष्य दावित ॥ गुरुसेवा वरी वरी ॥४३॥

कुसुंब्याचा आरक्त रंग ॥ आरंभीं दावी सुरंग ॥ किंवा नटें धरिलें सोंग ॥ विरक्ताचें व्यर्थ पैं ॥४४॥

तैसा आतापी मावकर ॥ ऋषीस दावी बहुत आदर ॥ वरी शब्द रसाळ फार ॥ अंतरीं कातर दुरात्मा ॥४५॥

असो आतापी कापट्यवेषी ॥ आश्रमा नेत अगस्तीसी ॥ वातापी फळें वेगेंसीं ॥ होऊनियां बैसला ॥४६॥

अगस्तीनें भक्षिलीं फळें ॥ उदक नाहीं जों प्राशिलें ॥ तों कापट्य अवघे समजलें ॥ काय केलें कलशोद्भवें ॥४७॥

उदरावरी फिरवूनि हस्त ॥ दैत्य भस्म केला पोटांत ॥ दोघे नाम घेऊनि बाहत ॥ बाहेर त्वरित ये आतां ॥४८॥

तंव तो नेदी प्रत्युत्तर ॥ तंव दोघे रूप धरिती थोर ॥ महाविक्राळ भयंकर ॥ धांवले सत्वर ऋषीवरी ॥४९॥

धनुष्या चढवोनि गुण ॥ अगस्तीनें सोडिला बाण ॥ वातापीचें शिर छेदून ॥ नेलें उडवोनि आकाशीं ॥१५०॥

दोघे निमाले देखोन ॥ इल्वल पळाला तेथून ॥ तंव तो घटोद्भव क्रोधायमान ॥ पाठीं लागला तयाचे ॥५१॥

पळतां सरली अवघी जगती ॥ परी पाठ न सोडी अगस्ती ॥ तंव तो उदक होऊनि कापट्यगती ॥ समुद्रजळीं मिसळला ॥५२॥

क्रोधायमान ऋषीश्र्वर ॥ तत्काळ पसरूनि दोन्ही कर ॥ आचमन करूनि सागर ॥ उदरामाजी सांठविला ॥५३॥

म्हणे उदारा रघुपति ॥ ऐसा पुरुषार्थी अगस्ति ॥ त्याची भेटी घेऊनि निश्र्चिंतीं ॥ सीतापति पुढें जाय तूं ॥५४॥

मग सुतीक्ष्णाची आज्ञा ॥ घेऊनियां रामराणा ॥ चालिला कर्दळीवना ॥ अगस्तीच्या आश्रमाप्रति ॥५५॥

तों मार्गीं अगस्तीचा बंधु ॥ महामतीनाम तपसिंधु ॥ त्याचे आश्रमीं आनंदकंदु ॥ सीतावल्लभ राहिला ॥५६॥

तेथें क्रमोनि एक दिन ॥ पुढें जात रविकुळभूषण ॥ तों देखिलें अगस्तीचें वन ॥ शोभायमान सदाफळ ॥५७॥

छाया शीतळ सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥ नारळी पोफळी रातांजन ॥ गेले भेदोनि गगनातें ॥५८॥

अशोक वृक्ष उतोतिया ॥ रायआंवळे खिरणिया ॥ निंब वट पिंपळ वाढोनियां ॥ सुंदर डाहाळिया शोभती ॥५९॥

डाळिंबें सांवरी पारिजातक मांदार ॥ चंदन मोहवृक्ष अंजीर ॥ चंपक जाई जुई परिकर ॥ बकुळ मोगरे शोभती ॥१६०॥

तुळसी मंदार कोविदार ॥ शेवंती चंपावृक्ष परिकर ॥ कनकवेली नागवेली सुंदर ॥ पोवळवेली आरक्त ॥६१॥

कल्पवृक्ष आणि चंदन ॥ गरुडवृक्ष आणि अर्जुन ॥ वाळियांची बेटें सुवासिक पूर्ण ॥ कर्पूरकर्दळी डोलती ॥६२॥

शाल तमाल पारिजातक ॥ शिरीष रायचंपक अशोक ॥ फणस निंबोळी मातुलिंग सुरेख ॥ अगर कृष्णागर सुवास ॥६३॥

मयूर बदकें चातकें ॥ कस्तूरीमृग जवादी बिडालकें ॥ राजहंस नकुल चक्रवाकें ॥ कोकिळा कौतुकें बाहती ॥६४॥

धन्य धन्य ऋषि अगस्ति ॥ श्र्वापदें निर्वैर विचरती ॥ पक्षी शास्त्रचर्चा करिती ॥ पंडित बोलती जे रीतीनें ॥६५॥

ठायीं ठायीं वनांत ॥ शिष्य वेदाध्ययन करित ॥ न्याय मीमांसा सांख्य पढत ॥ तर्क घेत नानापरी ॥६६॥

पातंजल आणि व्याकरण ॥ एक वेदांतशास्त्रप्रवीण ॥ एक समाधि सुखीं तल्लीन ॥ एक मौन्येंच डुल्लती ॥६७॥

नानाग्रंथींचें श्रवण ॥ ठायीं ठायीं होत पुराण ॥ अष्टांगयोगादि नाना साधन ॥ मनोजय करिताती ॥६८॥

असो शिष्य गेले धांवून ॥ अगस्तीसी सांगती हर्षे करून ॥ श्रीराम सीता लक्ष्मण ॥ जवळी आले गुरुवर्या ॥६९॥

ऐसें ऐकतां ते अवसरीं ॥ ऋषीचा आनंद न माये अंबरीं ॥ सकळिकांसी म्हणे उठा झडकरी ॥ जाऊं राघवा सामोरे ॥१७०॥

समाधि जप तप अनुष्ठान ॥ करूनि पावावे जयाचे चरण ॥ तो राजीवनेत्र रघुनंदन ॥ आश्रमा आपण पातला ॥७१॥

जो जगद्वंद्य आदिसोयरा ॥ जो अगम्य विधिशक्रकर्पूरगौरा ॥ मूळ न धाडितां आमचे मंदिरा ॥ पूर्वभाग्यें पातला ॥७२॥

जैशा नद्या भरूनियां ॥ जाती नदेश्र्वरासी भेटावया ॥ तैसा अगस्ति लवलाह्यां ॥ श्रीरामाजवळी पातला ॥७३॥

देखोनियां ऋषीचें भार ॥ राम सौमित्र घालिती नमस्कार ॥ घटोद्भवें पुढें धांवोनि सत्वर ॥ रघुवीर आलिंगिला ॥७४॥

रमापति आणि उमापति ॥ प्रीतीनें जैसे भेटती ॥ कीं इंद्र आणि बृहस्पति ॥ आलिंगिती परस्परें ॥७५॥

परम सद्रद ऋषीचें मन ॥ म्हणे धन्य धन्य आजिचा दिन ॥ कौसल्यागर्भरघुनंदन ॥ नेत्रीं देखिला धणीवरी ॥७६॥

असो इतरही मुनीश्र्वरां ॥ भेटला अनादिसोयरा ॥ ब्राह्मणीं वेष्टिलें जनकजावरा ॥ याचकीं वेष्टिला दाता जेवीं ॥७७॥

कीं चंदनवेष्टित फणिवर ॥ कीं भूपती भोंवता दळभार ॥ कीं ते बहुत मिळोनि चकोर ॥ ऋक्षपतीसी विलोकिती ॥७८॥

कीं विलोकितां सौदामिनीपति ॥ नीलकंठ आनंदें नाचती ॥ कीं महावैद्य देखोनि धांवती ॥ व्यथाभिभूत जैसे कां ॥७९॥

कीं उगवतां सहस्रकर ॥ चक्रवाकें तोषती अपार ॥ तैसा देखतां जगदुद्धार ॥ मुनीश्र्वर संतोषले ॥१८०॥

देखोनियां ऋषीमंडळी ॥ परम लज्जित जनकबाळी ॥ मग जाऊनि निराळी ॥ उभी ठाकली क्षण एक ॥८१॥

तंव ऋषिपत्न्या असंख्यात ॥ पहावया धांवल्या रघुनाथ ॥ तों ऋषिमाजी सीताकांत ॥ कोण तो नये प्रत्यया ॥८२॥

जगीं असोनि जगदीश्र्वर ॥ नेणती जैसे भ्रांत नर ॥ तैसा ऋषींत असोनि रामचंद्र ॥ ऋृषिपत्न्यांसी दिसेना ॥८३॥

साधक शरण सद्रुरूशीं ॥ तैशा त्या येती सीतेपाशीं ॥ म्हणती रघुवीर प्रत्ययासी ॥ आणूनि देईं आम्हांतें ॥८४॥

जैसी आदिमाया भगवती ॥ तीस वेष्टित अनंतशक्ति ॥ तैशा ऋषिपत्न्या सीतासती ॥ वेष्टोनियां पुसती तियेतें ॥८५॥

पुराणपुरुष रघुनंदन ॥ ऋषिवृंदांत आहे पूर्ण ॥ परी अमुकचि राम म्हणोन ॥ दावीं आम्हांसी माउलिये ॥८६॥

अवघे जटाजूट तापसी ॥ एकाहूनि एक तेजोराशी ॥ परी तव नेत्रचकोर शशी ॥ दावीं आम्हांसी माउलिये ॥८७॥

जवळी असोनि राघवेंद्र ॥ नव्हे आम्हांसी कां गोचर ॥ परी मंगळभगिनी तुझा वर ॥ मंगळकारक दावीं आम्हां ॥८८॥

चौऱ्यांयशीं लक्ष गर्भवास ॥ हिंडतां शिणलों बहुवस ॥ परी तो मखपाळक सर्वेश ॥ आदिपुरुष दावीं कां ॥८९॥

मृगनाभीं असोनि मृगमद ॥ परी तो नेणेचि मतिमंद ॥ कीं जवळ रत्न असोनि गर्भांध ॥ नेणें जैसा अभाग्य ॥१९०॥

जो वेदवल्लीचें दिव्य फळ जाण ॥ जो सरसिजोद्भवाचें अनादि धन ॥ जो नारदादिकांचें गुह्य पूर्ण ॥ ध्येय ध्यान विषकंठाचें ॥९१॥

ऐशा नानापरी पूसती ॥ परी न बोले सीतासती ॥ मग ऋषिस्त्रिया ध्यानें वर्णिती ॥ नाना ऋृषींचीं ते वेळीं ॥९२॥

ज्या ज्या ऋषींचें वर्णिती ध्यान ॥ तों तों जानकी हालवी मान ॥ जैसा दृश्य पदार्थ संपूर्ण ॥ वेदश्रुती निरसिती ॥९३॥

जे जे दिसतें तें तें नाशिवंत ॥ तें चिन्मय नव्हे अशाश्र्वत ॥ ऋषिस्त्रिया स्वरूप वर्णित ॥ मान हालवित सीता तेथें ॥९४॥

वेदशास्त्रां पडलें मौन ॥ तो केवीं बोलिजे शब्देंकरून ॥ यालागीं न बोले वचन ॥ हालवी मान जानकी ॥९५॥

हस्तसंकेतें करून ॥ जरी दावावा रघुनंदन ॥ तरी तो एकदेशी नव्हे पूर्ण ॥ जो निर्गुण निर्विकारी ॥९६॥

योग याग साधनें अपार ॥ करितां शिणती साधक नर ॥ तेवीं ऋषिस्त्रिया शिणल्या थोर ॥ रूपें वर्णितां स्वचित्तीं ॥९७॥

जैसी वेदांचिये शेवटीं ॥ स्वरूपी पडे ऐक्य मिठी ॥ तैसा श्रीराम देखिला दृष्टीं ॥ ऋषिस्त्रियांनीं अकस्मात ॥९८॥

म्हणती सजलजलदवर्ण ॥ आकर्णनेत्र सुहास्यवदन ॥ वाटे ब्रह्मानंदचि मुरोन ॥ मूर्ति ओतिली चिन्मय ॥९९॥

जटाजूटमुकुट पूर्ण ॥ आजानुबाहु वल्कलवसन ॥ हातीं विराजती चापबाण ॥ पति होय कीं हा तुझा ॥२००॥

ऐसें ऐकतां वचन ॥ सीतेनें केलें हास्यवदन ॥ हालवितां राहिली मान ॥ उन्मीलित नयन जाहले ॥१॥

ऋषिपत्न्यांतें कळली खूण ॥ प्रत्यया आला रघुनंदन ॥ विलोकितां राघवध्यान ॥ धाल्या पूर्ण ब्रह्मानंदें ॥२॥

मग सीतेचिया चरणीं मिठी ॥ घालिती सकळ त्या गोरटी ॥ म्हणती माते धन्य सृष्टी ॥ राम जगजेठी दाविला ॥३॥

जैसा मौन धरूनि वेद ॥ संतांसीं दावी ब्रह्मपद ॥ तैसा सीतेनें परमानंद ॥ ऋषिपत्न्यांसी दाविला ॥४॥

आतां असो हा पसार ॥ अगस्तीनें श्रीरामचंद्र ॥ आश्रमा नेऊनि साचार ॥ परमानंदें पूजिला ॥५॥

अक्षय चाप अक्षय भाते ॥ अक्षय कवच रघुत्तमातें ॥ शस्त्रें अस्त्रें मंत्रसामर्थ्यें ॥ दशरथीतें दीधलीं ॥६॥

जैसा नवग्रहांत चंडकिरण ॥ तैसा दिधला एक बाण ॥ म्हणे याच शिरें रावण ॥ शेवटीं धाडीं निजधामा ॥७॥

एक मासपर्यंत ॥ तेथें काळ क्रमी रघुनाथ ॥ मग घटोद्भवासी पुसत ॥ आम्हीं आतां रहावें कोठें ॥८॥

अगस्ति म्हणे गोदातटीं ॥ वस्तीसी स्थान पंचवटी ॥ तेथें तूं राहे जगजेठी ॥ सीता गोरटी जतन करीं ॥९॥

आज्ञा घेऊनि ते वेळां ॥ पंचवटी श्रीराम चालिला ॥ वाटेसी जटायु देखिला ॥ राघवेंद्रें अकस्मात ॥२१०॥

पथीं बैसला जैसा पर्वत ॥ श्रीराम सौमित्रासी पुसत ॥ हा राक्षस होय यथार्थ ॥ आणीं त्वरित धनुष्य बाण ॥११॥

दोन्ही तूणीर घननीळें ॥ पाठीसी दोहींकडे आकर्षिले ॥ तंव तो जटायु ते वेळे ॥ काय बोले दुरूनियां ॥१२॥

म्हणे ये वनांतरीं तूं कोण ॥ मजवरी टाकिसी बाण ॥ सांग तुझें नामभिधान ॥ मग रघुनंदन बोलत ॥१३॥

रविकुळमंडण दशरथ ॥ त्याचा पुत्र मी रघुनाथ ॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ जटायु जवळी पातला ॥१४॥

म्हणे कश्यपसुत अरुण ॥ तो माझा जनिता पूर्ण ॥ पितृव्य माझा सुपर्ण ॥ जटायु जाण नाम माझें ॥१५॥

माझा ज्येष्ठबंधु सांपाती ॥ तो दक्षिणसागरीं करी वस्ती ॥ तुझा पिता दशरथ नृपती ॥ मज बंधुत्वें मानीतसे ॥१६॥

शक्रासी युद्ध करितां ॥ मी साह्य झालों दशरथा ॥ मज बंधुत्व मानी तत्वतां ॥ अजराजपुत्र ते काळीं ॥१७॥

ऐसी ऐकतांचि मात ॥ सद्रदित झाला रघुनाथ ॥ जटायूचे कंठी मिठी घालित ॥ म्हणे तूं निश्र्चित पितृव्य माझा ॥१८॥

मग जटायूचे अनुमतें ॥ श्रीराम राहे पंचवटीतें ॥ पर्णशाळा सुमित्रासुतें ॥ विशाळ रचिल्या ते वेळे ॥१९॥

फळें मुळें आणून ॥ नित्य देत सुमित्रानंदन ॥ आपण निराहार निर्वाण ॥ चतुर्दशवर्षेंपर्यंत ॥२२०॥

जानकी भावी ऐसें मनीं ॥ लक्ष्मण फळें भक्षितो वनीं ॥ मग आणितो आम्हांलागुनी ॥ फळें घ्या म्हणोनि म्हणतसे ॥२१॥

सीतेचे आज्ञेविण ॥ सौमित्र न करी फळें भक्षण ॥ नित्य उपवासी निर्वाण ॥ तो लक्ष्मण महाराज ॥२२॥

पुढील जाणोनि भविष्यार्थ ॥ फळें नेदी रघुनाथ ॥ याच प्रकारें दिवस बहुत ॥ उपवास झाले तयासी ॥२३॥

पर्णकुटीचा द्वारपाळ ॥ सर्वकाळ सुमित्राबाळ ॥ तो विष्णुशयन फणिपाळ ॥ सेवा प्रबळ करीतसे ॥२४॥

रात्रीमाजी लक्ष्मण ॥ हातीं घेऊनि धनुष्यबाण ॥ राक्षस येतील म्हणोन ॥ सावधान सर्वदा ॥२५॥

निद्रा आणि आहार ॥ कधीं न स्पर्शे सौमित्र ॥ भक्तराज परम पवित्र ॥ जैसा निर्मळ मित्र सदा ॥२६॥

पंचवटीस राहिला रघुनाथ ॥ चहूंकडे प्रकटली मात ॥ तों वनभिल्लस्त्रिया मिळोनि बहुत ॥ म्हणती राघव पाहूं चला ॥२७॥

अयोध्याधीश रघुपति ॥ बहुत ऐकतों त्याची किर्ति ॥ एकवचन एकपत्नीव्रती ॥ चला निश्र्चितीं पाहूं तो ॥२८॥

निरंजनी राहिला रघुनाथ ॥ तो डोळेभरी पाहों यथार्थ ॥ अरिदर्पहरण सीताकांत ॥ पाहूं चला एकदां ॥२९॥

जो निर्विकार परब्रह्म ॥ तो सगुण सुवेष श्रीराम ॥ ज्याचे श्रुति नेणती वर्म ॥ तो पूर्णकाम पाहूं चला ॥२३०॥

म्हणती परब्रह्म सांवळे ॥ भेटीसी न्यावी अमृतफळें ॥ पूर्वपुण्य असेल आगळें ॥ गुण गाती श्रीरामाचे ॥३१॥

अपार मिळोनि भिल्लिणी ॥ उत्तम फळें वेंचिती वनीं ॥ नाचत नाचत कामिनी ॥ गुण गाती श्रीरामाचे ॥३२॥

ज्याचें नाम घेतां निर्मळ ॥ शीतळ जाहला जाश्र्वनीळ ॥ चरणरजें तात्काळ ॥ गौतमललना तारिली ॥३३॥

एक जानकी वेगळीकरून ॥ सकळ स्त्रिया कौसल्येसमान ॥ जो दशकंठदर्पहरण ॥ मखरक्षण मखभोक्ता ॥३४॥

अहो पूर्वकर्म निर्मळ ॥ पाहावया परब्रह्म उतावेळ ॥ हेंच उत्तम साचें फळ ॥ पंचवटीसी आलिया ॥३५॥

पंचभूतात्मक पंचवटी ॥ नरदेहास आल्या गोरटी ॥ श्रीराम देखतां दृष्टीं ॥ घालिती सृष्टी लोटांगण ॥३६॥

पूर्वफळें आणिलीं होतीं ॥ समस्त अर्पिलीं रघुपतीप्रती ॥ देखोनि तयांची भक्ति ॥ फळें भक्षीत सीताराम ॥३७॥

नित्यकाळ भिल्लिणी ॥ रामास फळें देती आणोनी ॥ येथें कितीएक जनीं ॥ विपरीत वाणी बोलिजे ॥३८॥

म्हणती उच्छिष्ट फळें भक्षिलीं ॥ हे सर्वथा असत्य बोली ॥ तीं उत्तम फळें पाहोनि रक्षिलीं ॥ श्रीरामभेटीकारणें ॥३९॥

मूळ न पाहतां यथार्थ ॥ भलतेंचि करी जो स्थापिति ॥ त्यासी बंधन यथार्थ ॥ चंद्रार्कवरी चुकेना ॥२४०॥

असो श्रीरामविजय ग्रंथ ॥ हाचि अमृतवृक्ष यथार्थ ॥ येथींचीं फळें रघुनाथभक्त ॥ सदा भक्षिती प्रीतीनें ॥४१॥

ब्रह्मानंदा जगदोद्धारा ॥ पंचवटीवासिया श्रीधरवरा ॥ आदिपुरुषा निर्विकारा ॥ अचळ अभंगा अक्षया ॥४२॥

इति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ त्रयोदशाध्याय गोड हा ॥२४३॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु॥ 

श्रीरामविजयअध्याय १४ वा

श्रीगणेशाय नमः

श्रीरामकथा ऐकतां सादर ॥ सुख उपजे अपार ॥ शशांक देखोनि सागर ॥ पूर्ण जैसा उचंबळे ॥१॥

सद्रुरु वर्षतां कृपाघन ॥ शिष्यसरितेसी ये स्वानंदजीवन ॥ कीं उगवतां सूर्यनारायण ॥ अरविंदें विकासती ॥२॥

कीं दुर्बळासी सांपडे धन ॥ कीं वणव्यांत जळतां वर्षे घन ॥ वसंतकाळ देखोन ॥ द्रुप जैसे फूलती पैं ॥३॥

ऐसी कथा ऐकतां उपजे सुख ॥ जे कथेसी भुलला कैलासनायक ॥ पार्वतीसह प्रेमं देख ॥ रामकथा हृदयीं धरिली ॥४॥

जे मोक्षतरूचें बीज देखा ॥ जे भवनदीमाजीं तारक नौका ॥ जे अज्ञानतिमिरदिपिका ॥ वाल्मीकें हे पाजळली ॥५॥

कीं अविद्याकाननवैश्र्वानर ॥ कीं एश्र्वर्यपीठांची देवी सुंदर ॥ कीं मनोरथमोक्षांची जननी ॥ कं पापतापभंजनी ॥ मंदाकिनी प्रत्यक्ष हे ॥७॥

ऐसी कथा अत्यंत पावन ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ तेरावे अध्यायीं कथन ॥ आला रघुनंदन पंचवटीये ॥८॥

जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो कमळिणीमित्रकुलभूषण ॥ मेदिनीगर्भरत्नजीवन ॥ पंचवटीये राहिला ॥९॥

जो भूधरावतार लक्ष्मण ॥ जो नरवीरांमाजी पंचानन ॥ सुरस फळें नित्य नूतन ॥ काननींहून आणित ॥१०॥

ऐसें असतां कोणे एके काळीं ॥ लक्ष्मण विलोकितां वनस्थळीं ॥ तो देखिली वंशजाळी ॥ सरळ गगनचुंबित ॥११॥

ते वंशजाळीभीतरीं ॥ दशकंठाचा भाचा शंबरी ॥ विषकंठाचें आराधन करी ॥ काळखड्रप्राप्तीतें ॥१२॥

साठीसहस्रवर्षेपर्यंत ॥ तप दारुण करितां तेथ ॥ वंशजाळीत असे गुप्त ॥ बाहेर न दिसे कोणातें ॥१३॥

माध्यान्हीं आला आदित्य ॥ तो काळखड्र अकस्मात ॥ गगनपंथें उतरत ॥ सुमित्रासुतें देखिलें ॥१४॥

तंव ते मनीं भावी शस्त्रदेवता ॥ मी नवजाय शंबरीच्या हाता ॥ शरण जाईन सुमित्रासुता ॥ हरीन जीवीता शंबरीच्या ॥१५॥

सभाग्यापुढें चिंतामणी ॥ पडे अकस्मात येऊनी ॥ तैसें काळशस्त्र ते क्षणीं ॥ सौमित्राजवळी पातलें ॥१६॥

सौमित्रें हाती घेतलें शस्त्र ॥ म्हणे कृपाळु तो त्रिनेत्र ॥ ऐसें बोलोनि अजराजपौत्र ॥ परमानंदें तोषला ॥१७॥

मग तो उर्मिलाप्राणाधार ॥ वस्त्रें पुसिलें काळशास्त्र ॥ म्हणे याचा प्रताप दिसे अपार ॥ पाहूं धार कैसी ते ॥१८॥

जेणें पुष्पप्राय धरिली धरणी ॥ तेणें निजबळें शस्त्र उचलोनी ॥ शंबरीसहित जाळी ते क्षणीं ॥ दुखंड केली तत्काळ ॥१९॥

शोणिताचा चालिला पूर ॥ साशंकित पाहे उर्मिलावर ॥ म्हणे कवण होता येथें विप्र ॥ नेणोनि साचार वधिला म्यां ॥२०॥

चिंतातुर राघवानुज ॥ तपस्वी वधिला नेणोनि सहज ॥ आतां कोपेल रघुराज ॥ मुखांबुज कोमाइलें ॥२१॥

असो याउपरी परतला ॥ जानकी मार्ग लक्षी वेळोवेळां ॥ म्हणे माध्यान्हकाळ टळला ॥ सौमित्रें लाविला उशीर कां ॥२२॥

ऐसें विलोकीं क्षणक्षणां ॥ तों येतां देखिलें लक्ष्मणा ॥ शस्त्र देखोनि मृगनयना ॥ अहल्योद्धरणाप्रति बोले ॥२३॥

म्हणे स्वामी आजि लक्ष्मण ॥ येत मंद मंद म्लानवदन ॥ तंव तो सर्वसाक्षी पूर्ण चैतन्यघन ॥ अंतरखूण जाणतसे ॥२४॥

तंव तो पावला महावीर ॥ रघुपतीपुढें ठेविलें शस्त्र ॥ जोडोनियां दोन्ही कर ॥ समाचार सांगितला ॥२५॥

म्हणे अयोध्याधीशा समर्था ॥ अकस्मात खड्ग आलें हाता ॥ वंशजाळी हाणोनि पाहतां ॥ तपस्वी घात पावला ॥२६॥

मग सुहास्यवदन जनकजामात ॥ म्हणे द्विज नव्हे तो राक्षस यथार्थ ॥ शूर्पणखेचा तो सुत ॥ भाचा जाण रावणाचा ॥२७॥

तो बहुत दिवस तप करित होता ॥ काळखड्र यावें हाता ॥ मग इंद्रादिदेवां समस्तां ॥ अजिंक्य व्हावें समरांत ॥२८॥

दुजयाचा चिंतिती घात ॥ त्यांसीं निर्दाळी उमाकांत ॥ ज्याची क्रिया त्यास बाधित ॥ अति अनर्थसूचक जे ॥२९॥

जैसे खणूं जातां वारुळ ॥ महासर्पें डंखिलें तत्काळ ॥ कीं हातीं धरितां तप्त लोहगोळ ॥ भस्म होय तेधवां ॥३०॥

जैसा शुष्ककाष्ठछिद्रीं चरण ॥ बळेंचि घालिजे नेऊन ॥ वरी खीळ बैसविली ठोकून ॥ मग करितां रुदन न निघेची ॥३१॥

जे जे आपण क्रिया करावी ॥ ते ते सवेंचि लागे भोगावी ॥ परी सौमित्रा आतां सीता रक्षावी ॥ न विसंबावी क्षण एक ॥३२॥

आतां येथून महाद्वंद्व ॥ मांडेल असावें सावध ॥ राक्षसी मावा नानाविध ॥ ब्रह्मादिकां न कळती ॥३३॥

हें एक बरवें जाहलें ॥ जें काळखड्र हातासी आलें ॥ ऐसें ऐकतां ते वेळे ॥ मन तोषलें सौमित्राचें ॥३४॥

तंव ते रावणाची भगिनी ॥ शूर्पणखा शंबरीची जननी ॥ रात्री दुष्ट स्वप्न देखोनि ॥ सावध जाहली तात्काळ ॥३५॥

मग विचार करून मानसीं ॥ सवें घेतल्या चौघी राक्षसी ॥ सवेग चालिसी वनासी ॥ निजपुत्रासी पहावया ॥३६॥

लंकेबाहेर जों आली ॥ तों दिनकरें प्रभा केली ॥ मार्ग चालतां वेळोवेळीं ॥ वंशजाळी विलोकित ॥३७॥

तंव ते न दिसेचि पाहतां ॥ देखे गृध्र मंडळ घालितां ॥ धापा दाटली धांवतां ॥ स्थळबीभत्सता देखोनी ॥३८॥

जवळी येऊनियां पाहे ॥ तों पुत्रासहित जाळी घायें ॥ द्विखंड होवोनि पडिली आहे ॥ रुधिर वाहे भडांभडां ॥३९॥

मग धाय मोकलोनि कैशी ॥ गडबडां लोळे भूमीसी ॥ जळावेगळी मासोळी जैशी ॥ चडफडी तैशी अतिशोकें ॥४०॥

मग उठवोनी सखियांनीं ॥ बैसविली सावध करूनी ॥ म्हणती पुढील कार्य मनासी आणीं ॥ कोणें वनीं सुत वधियेला ॥४१॥

मग ते राक्षसी उठोन । भोंवते पाहे विलोकून ॥ तों मानवी पदमुद्रा देखोन ॥ विस्मय करी मानसीं ॥४२॥

शंबरीसहित जाळभ् ॥ एके घायें खंड केली ॥ तरी काय राक्षसांची सीमा जाहली ॥ आयुष्याची येथोनियां ॥४३॥

असो दहन करून शंबरीसी ॥ वन शोधिती तेव्हां राक्षसी ॥ तों दुरोनि देखिलें सौमित्रासी ॥ जैसा तेजस्वी चंडाशु ॥४४॥

शूर्पणखा म्हणे हाचि काळ ॥ येणेंचि ग्रासिला माझा बाळ ॥ मग कापट्यवेष तात्काळ ॥ धरित्या जाहल्या राक्षसी ॥४५॥

रंभेहूनि सुंदर देखा ॥ स्वरूपें नटली शूर्पणखा ॥ सवें चौघीजणी सख्या ॥ भुले देखतां अनंग ॥४६॥

चौघीजणी दोहींकडे ॥ मध्यें शूर्पणखा दिव्य रूपडें ॥ जिच्या स्वरूपाचा प्रकाश पडे ॥ काननामाजीं हिंडतां ॥४७॥

चौघींच्या स्कंधावरी हात ॥ पादुका पायीं रत्नखचित ॥ हावभाव कटाक्ष दावित ॥ गायन करी मधुरस्वरें ॥४८॥

आल्हादकारक चंद्रवदन ॥ वदनीं बोलतां झळकती दशन ॥ चाले गजगती मोडोनि नयन ॥ उर्मिलाजीवन देखोनियां ॥४९॥

हळूच सख्यांसी बोलत ॥ येणेंचि वधिला गे माझा सुत ॥ तरी यासी सगळेंचि मुखांत ॥ घालोनि गिळीन निर्धारें ॥५०॥

तो सौमित्र करीत रामस्मरण ॥ काननामाजी करी भ्रमण ॥ जैसे कमळावरी भ्रमर जाण ॥ ठायीं ठायीं रुणझुणती ॥५१॥

तों शूर्पणखा ते वेळीं ॥ सवेग पातली सौमित्राजवळी ॥ कामचेष्टा करी वेळोवेळीं ॥ वचन माधुर्य बोलोनियां ॥५२॥

तो सौमित्र करीत रामस्मरण ॥ काननामाजी करी भ्रमण ॥ जैसे कमळावरी भ्रमर जाण ॥ ठायीं ठायीं रुणझुणती ॥५१॥

तों शूर्पणखा ते वेळीं ॥ सवेग पातली सौमित्राजवळी ॥ कामचेष्टा करी वेळोवेळीं ॥ वचन माधुर्य बोलोनियां ॥५२॥

म्हणे वो अवधारा सुंदरा ॥ बहुत हिंडल्यें वसुंधरा ॥ परी मजयोग्य न मिळे नोवरा ॥ कुशळ चतुर प्रतापी ॥५३॥

तरी आजि माझें धन्य भाग्य ॥ पावल्यें स्वामीचें अर्धांग ॥ आजि तप फळले सांग ॥ आली सवेग पुढेंचि ॥५४॥

घेऊनियां नवरत्नमाळा ॥ घालावया आली गळां ॥ तंव तो महाराज सत्त्वगळा ॥ जो अवतरला भोगींद्र ॥५५॥

गुणसिंधु जानकीजीवन ॥ त्याची कृपा जयावरी पूर्ण ॥ विषयसंगें त्याचें मन ॥ काळत्रयीं मळेना ॥५६॥

जेणें प्राशिला सुधारस ॥ त्यासीं काय बाधेल महाविष ॥ जो सूर्यासन्निध करील वास ॥ तम केवीं त्यासी बाधेल ॥५७॥

कामधेनू ज्याचे मंदिरीं ॥ तो कधींच नव्हे दरिद्री ॥ जो पहुडला आनंदसमुद्रीं ॥ कर्मबंधीं न पडे तो ॥५८॥

कल्पवृक्ष आंगणीं देख ॥ तो कासया मागेल भीक ॥ ज्यासी भेटला वैकुंठनायक ॥ तो न पूजी भूतें प्रेतें ॥५९॥

उर्वशीसमान ज्याची ललना ॥ तो कदाही प्रेत कवळीना ॥ नंदनवनींचा भ्रमर जाणा ॥ अर्कीवरी न बैसे ॥६०॥

जो भ्रमरमंचकावरी ॥ पहुडणार अहोरात्रीं ॥ तो निजेल खदिरांगारीं ॥ हें काळत्रयीं घडेना ॥६१॥

ज्याचे अंगीं मृगमदाची उटी ॥ तो काकविष्ठा न पाहे दृष्टीं ॥ जो बैसला क्षीराब्धीच्या तटीं ॥ तो कां कांजी इच्छील ॥६२॥

असो ऐसा लक्ष्मण ॥ तो आहाररहित निर्वाण ॥ तो शूर्पणखेसी प्रतिवचन ॥ बोलता जाहला तेधवां ॥६३॥

मग म्हणे वो सुंदरी राहें ॥ आम्हां सीताराम वडील आहे ॥ पैल वसती पंचवटिये ॥ उमामहेश्र्वर ज्यापरी ॥६४॥

मायबाप गुरु बंधु ॥ रघुवीर माझा कृपासिंधु ॥ त्याचे आज्ञेविण हा संबंधु ॥ कालत्रयीं घडेना ॥६५॥

शेष सांडील भूभार ॥ पूर्वेस मावळेल दिनकर ॥ तरी राम आज्ञेविण साचार ॥ तुज न वरीं निर्धारें ॥६६॥

तों शूर्पणखा बोले वचन ॥ तरी मी आणित्यें रामाची खूण ॥ अवश्य म्हणे लक्ष्मण ॥ येरी तेथून चालिली ॥६७॥

सांगातें सखिया चौघीजणी ॥ विचार सांगे त्यालागुनी ॥ राम लक्ष्मण सीता तिन्हीं ॥ रात्रीं गिळोनि जाऊं लंके ॥६८॥

आमुची कार्यसिद्धी येथून ॥ सख्याहो जाहली परिपूर्ण ॥ मग ये वनींचे ब्राह्मण ॥ भक्षूं शाधोनि साक्षेपें ॥६९॥

ऐसें विचारोनि मानसीं ॥ वेगें आली पंचवटीसी ॥ देखोनियां सीतारामासी ॥ साष्टांग नमन पैं केलें ॥७०॥

आजि माझे भाग्य पूर्ण ॥ देखिले भावें स्वामिचरण ॥ बाई मी तुम्हांसी शरण ॥ जाऊ जाहल्यें तुमची मी ॥७१॥

मजवरी स्नेह करावा बहुत ॥ भावोजींस प्रार्थोनि त्वरित ॥ मजजवळी द्यावें लिखित ॥ प्राणनाथ वरावया ॥७२॥

चरण त्यांचे कोमळ चांगले ॥ वनीं हिंडताती एकले ॥ तळहातीन करकमळें ॥ सुमनसेजे घोलोनि ॥७३॥

भावोजींचे आज्ञेविण पाहें ॥ मज ते वरीत नाहींत करूं काये ॥ अहा त्यांचा वियोग न साहे ॥ विरहें जाय प्राण हा ॥७४॥

डोळां आसुवें आणिलीं लवलाहीं ॥ पतीस माझा विश्र्वास नाहीं ॥ पुढें जन्म कंठणें एके ठायीं ॥ भावोजींस बाई सांगा जी ॥७५॥

मी केवळ पतिव्रता साचार ॥ कर्णकुमारी परमपवित्र ॥ मज एकही पुरुषाचा पदर ॥ बाई लागला नाहींच ॥७६॥

त्यावीण मज पुरुष इतर ॥ बंधूसमान साचार ॥ मागुती उदकें भरोनि नेत्र ॥ म्हणे सत्वर पत्र द्या आतां ॥७७॥

सीतेसी सुख वाटलें फार ॥ म्हणे बरवा जाहला विचार ॥ मज जाऊ मिळाली सुंदर ॥ ईस सौमित्र वर साजे ॥७८॥

मग म्हणे जी रघुराया ॥ ईस खुण द्यावी लवलाह्या ॥ स्वामी सौमित्रा योग्य जाया ॥ मिळाली जी निर्धारें ॥७९॥

मग तो सर्वात्मा रघुनायक ॥ चराचरचित्तपरीक्षक ॥ जो मायाचकचाळक ॥ कर्ता हर्ता पाळिता जो ॥८०॥

तिच्या उफराट्या बाहुल्या नेत्रांत ॥ न्याहाळून पाहे जनकजामात ॥ म्हणे हे निशाचरी यथार्थ ॥ छळावया आली असे ॥८१॥

नेत्रवक्रांचे तिचे विकार ॥ त्यावरोनि समजलें अंतर ॥ सुमनावरून सत्वर ॥ वृक्ष चतुर जाणती ॥८२॥

बोलावरोनि कळे चित्त ॥ आचरणावरून पूर्वार्जित ॥ क्रियेवरोनी वर्णाश्रम सत्य ॥ परीक्षक जाणती ॥८३॥

राहणीवरून कळे परमार्थ ॥ शब्दावरूनी कळे पांडित्य ॥ प्रेमावरोनी भक्त ॥ परीक्षक जाणती ॥८४॥

दानावरूनी कळे उदार ॥ रणीं समजे प्रजा शूर ॥ लक्षणांवरूनी नृपवर ॥ जाणती चतुर परीक्षक ॥८५॥

वास येतां कळे काष्ठ ॥ स्वरावरोनी समज कंठ ॥ कोंभावरून स्पष्ट ॥ भूमीचें मार्दव जाणिजे ॥८६॥

अंगणावरून समजे सदन ॥ भूतदयेवरून ब्रह्मज्ञान ॥ प्रमेवरून रत्न ॥ परीक्षक जाणती ॥८७॥

असो सर्वात्मा रघुवीर ॥ शूर्पणखेचें ओळखिलें अंतर ॥ आंत शठत्व मृदु शब्द बाहेर ॥ जाणे चतुर श्रीराम ॥८८॥

मुख शोभे जैसें कमळ ॥ शब्द चंदनाहून शीतळ ॥ परी अंतरीं धूर्त कुटिळ ॥ तमाळनीळें आळखिलें ॥८९॥

श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ लग्नपत्रिका लिहों दे पाठीवरी ॥ ऐकतां भयभीत निशाचरी ॥ विश्र्वास अंतरीं उपजेना ॥९०॥

सीतेसी म्हणे बाई ऐकतां ॥ भावोजींसमोर बोलतां ॥ मज लाज वाटे तत्वतां ॥ तुम्हीच प्रार्था तयांसी ॥९१॥

भावोजी चतुर आणि तरुण ॥ मी लज्जावेष्ठित कामिन ॥ त्यांपुढें बैसतां जाण ॥ जाईल प्राण वाटतसे ॥९२॥

मग बोले रघुनंदन ॥ पृष्ठीवरी लिहिल्याविण ॥ आणिक आम्हांपाशीं खूण ॥ दुजी नाहीं सर्वथा ॥९३॥

मग शूर्पणखा बोले वचन ॥ तरी पृष्ठीवरी लिहावी खूण ॥ अवश्य म्हणे रघुनंदन ॥ केलें लेखन पृष्ठीवरी ॥९४॥

श्रीराम म्हणे जाय सत्वर ॥ उशीर न लावीच सौमित्र ॥ ऐसें बोलतां शतपत्रनेत्र ॥ पवनवेगें चालिली ॥९५॥

मग लक्ष्मणाजवळी येऊन ॥ सांगे परम हर्षेकरून ॥ भावोजींनीं मज देखोनि मान ॥ मुखवचनें सांगितलें ॥९६॥

अवश्य वरावें तुम्हांसी ॥ ऐसें सांगितलें मजपाशीं ॥ गांधर्वलग्न निश्र्चयेसी ॥ तात्काळचि लावावें ॥९७॥

मग बोले लक्ष्मण ॥ न देखतां श्रीरामाची खूण ॥ तुज न वरीं मीच पूर्ण ॥ सत्य वचन हें माझें ॥९८॥

येरी म्हणे ते समयीं ॥ माझा विश्र्वास तुम्हांसी नाहीं ॥ पुढें जन्म कंठणें एके ठायीं ॥ दुजें कांहीं नसेचि ॥९९॥

मी येथें लटिकें बोलोन ॥ भावजींस काय दावूं वदन ॥ मी तयांलागीं भेटोन ॥ आल्यें आतां तत्वतां ॥१००

भावोजी जलदवर्ण सुंदर ॥ बाई चंपकळिका सुकुमार ॥ जवळ लिहावया नव्हतें पत्र ॥ सांगितलें तुम्हां वरावें ॥१॥

तुम्हासी श्रम जाहले थोर ॥ चरण तळहातीन सुकुमार ॥ कीं सौख्यशयनीं दोघें साचार ॥ निद्रा करूं क्षणभरी ॥२॥

परी न मानीच लक्ष्मण ॥ शूर्पणखा बोले हांसोन ॥ म्यां तों आणिली आहे खूण ॥ तुमचें मन पाहिलें म्यां ॥३॥

येरी खूण दाखवी पाठीची ॥ तों आज्ञा ऐशी श्रीरामाची ॥ शूर्पणखा भगिनी दशमुखाची ॥ इच्या नासिककर्णांची शांति करीं ॥४॥

कर्ण आणि नासिक सकळ ॥ सपाट करीं न लावीं वेळ ॥ नवरी श़ृंगारूनि अमंगळ ॥ लंकेकडे पाठवावी ॥५॥

स्त्रीवध न करावा जाण ॥ यालागीं राखें इचा प्राण ॥ ऐसें लक्ष्मणें वाचून ॥ म्हणे जाऊं चला एकांतीं ॥६॥

दूरी केल्या चौघीजणी ॥ धरिली शूर्पणखेची वेणी ॥ सौमित्रें पाडिली धरणीं ॥ पापखाणी ते निशाचरी ॥७॥

मग म्हणे प्राणनाथा ॥ मी सिद्ध आहे या कार्यार्था ॥ झोंबोनी कासया पाडितां ॥ नवल मज वाटतसे ॥८॥

लक्ष्मणें न लागतां क्षणमात्र ॥ छेदिलें नासिक आणि श्रोत्र ॥ तों ते आक्रंदली अपवित्र ॥ विशाळ शरीर धरियेलें ॥९॥

अत्यंत विशाळ भयंकर ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ नासिकापासोनि पूर ॥ अशुद्धाचा भडकतसे ॥११०॥

चौघीजणी समवेत ॥ पळती वाटेसी शंख करीत ॥ म्हणे धांवा धांवा रे समस्त ॥ राक्षस हो शीघ्रकाळें ॥११॥

पळतां पाहे मागें पुढें ॥ तो सौमित्रचि दृष्टीं पडे ॥ भोंवता दिसे चहूंकडे ॥ कोणीकडे जाऊं म्हणे ॥१२॥

अडखळोनि भूमीवर पडती ॥ मुखीं नासिकीं भरे माती ॥ पद्मपुराजवळी येती ॥ शंख करिती पांचजणी ॥१३॥

आक्रोश ऐकतां थोर ॥ त्रिशिका आणि दूषण खर ॥ सिद्ध करोनि चतुरंग दळभार ॥ आले सत्वर बाहेरी ॥१४॥

असुर पायींच नेटके ॥ पुढें चमकताती कौतुकें ॥ हातीं असिलता करीं खेटकें ॥ कटीं झळके यमदंष्ट्रा ॥१५॥

तों चालिले चतुरंग भारें ॥ जैसीं चित्रें लिहिलीं चित्रकारें ॥ तयांहून अतिसाजिरे ॥ सर्वालंकारें डवरिले ॥१६॥

वीर भयंकर रणरगडे ॥ जैसे काळाचे सवंगडे ॥ एक धांवती एकापुढें ॥ सिंहनादें गर्जती ॥१७॥

निघाले गजभार उन्मत्त ॥ कीं ते ऐरावतीचे सुत ॥ श्र्वेतवर्ण आणि चौदंत ॥ किंकाटत धांवती ॥१८॥

जिहीं युद्ध करोनि समरंगणीं ॥ सुरांचे मुकुट पाडिले धरणीं ॥ ते गजस्कंधावरी बैसोनी ॥ शस्त्रें तुळिती आनंदें ॥१९॥

त्यांमागें रथांचें भार ॥ वरी शस्त्र सामग्री अपार ॥ चौदा सहस्र महावीर ॥ एकवटले ते काळीं ॥१२०॥

त्रिशिरा आणि खर दूषण ॥ दळभारीं मुख्य तिघेजण ॥ तों शूर्पणखा पुढें येऊन ॥ शंख करीत उभी ठाके ॥२१॥

जैसा शेंदुरें माखिला पर्वत ॥ तैशी रक्तें चर्चिली आरक्त ॥ म्हणे राक्षस आटिले समस्त ॥ आला रघुनाथा पंचवटिये ॥२२॥

नवमेघरंग रघुवीर ॥ सौमित्र गौरवर्ण सुकुमार ॥ सीतेचें स्वरूप पाहतां पंचशर ॥ ओंवाळूनि टाकिजे ॥२३॥

तरी बहुत अरुवार लक्ष्मण ॥ त्याचे नरडीचा घोट घेईन ॥ तुम्ही सांगातें या अवघेजण ॥ रक्तपान करवा मज ॥२४॥

जेणें माझे नासिक छेदिलें ॥ त्यासी मी गिळिन सगळें ॥ त्रिशिरा खर दूषण हांसले ॥ बीभत्सरूप देखोनि ॥२५॥

म्हणती मानव तो रघुनंदन ॥ आम्ही त्यावरी जावें हें नीचपण ॥ मग राक्षस चौदाजण ॥ निवडोनियां काढिले ॥२६॥

ते शूर्पणखेसंगें देऊन ॥ म्हणती मारून रामलक्ष्मण ॥ ईस करावा रक्तपान ॥ समाधान होय तों ॥२७॥

मग शूर्पणखा आणि राक्षस ॥ वेगें जाती पंचवटीस ॥ म्हणती धरून रामसौमित्रांस ॥ जितचि न्यावे खरापाशीं ॥२८॥

एक म्हणती येथेंचि मारून ॥ आम्ही करूं मांसभक्षण ॥ आधीं करावावें रक्तपान ॥ शूर्पणखेसी साक्षेपें ॥२९॥

जैशी मृगेंद्राची निंदा देख ॥ मागें करिती जंबुक ॥ अळिका म्हो खगनायक ॥ धरून आणूं क्षणार्धें ॥१३०॥

तृणपुतळे मिळोनि बहुत ॥ वडवानळासी धरूं म्हणत ॥ कीं हृदयीं भाविती खद्योत ॥ आसडून आदित्य पाडूं खालीं ॥३१॥

शलभ म्हणती मिळोनी ॥ कल्पांतविजू घालूं वदनीं ॥ तैसे राक्षस आले धांवोनी ॥ पंचवटीस तेधवां ॥३२॥

रघुपतीस जाणवी लक्ष्मण ॥ राक्षस आले चौदाजण ॥ ऐसें ऐकतां रविकुलभूषण ॥ वाहात गुण धनुष्यातें ॥३३॥

पर्वतदरीमधून ॥ अकस्मात निघे पंचानन ॥ तैसा कौशिकमखरक्षण ॥ गुंफेबाहेर पातला ॥३४॥

राम नरवीरपंचानन ॥ चतुर्दशगज लक्षिले दूरून ॥ कीं शार्दूळें लक्षिलें हरिण ॥ रघुनंदन पाहे तैसा ॥३५॥

तों हांक देती निशाचर ॥ भोंवते तळपती भयंकर ॥ दारुण शस्त्रें अनिवार ॥ सोडिते झाले तेधवां ॥३६॥

जैसें मुर्खाचें वाग्जाळ बहुत ॥ एकेचि शब्दें वारी पंडित ॥ तैशीं अरिशस्त्रें वारोनि समस्त ॥ केलें अद्भुत श्रीरामें ॥३७॥

ओढी ओढोनि आकर्ण ॥ सोडिला सूर्यमुख बाण ॥ चौदाजणांची शिरें छेदून ॥ उर्वीवरी पाडिलीं ॥३८॥

मृगेंद्रें विदारिजे वारण ॥ तैसे पाडिले चौदाजण ॥ कीं अरुणानुजें दारुण ॥ भुजंग जैसे तोडिले ॥३९॥

राम राक्षसांतक प्रळयाग्न ॥ यासी चतुर्दश असुरांचे अवदान ॥ शूर्पणखेनें समर्पिलें आणून ॥ माघारी परतोनि पळतसे ॥१४०॥

सौमित्रें काढिला एक शर ॥ शूर्पणखेचें छेदावया शिर ॥ तंव ती म्हणे हा दावेदार ॥अद्यापिही सोडिना ॥४१॥

श्रीराम म्हणे सुमित्रासुता ॥ इसी न वधावें तुवां आतां ॥ हें सांगोनि राक्षसां समस्तां ॥ आणील येथें वधावया ॥४२॥

असो निर्नासिका शंख करित ॥ खरदूषणां येवोनि सांगत ॥ राक्षस मारिले समस्त ॥ तुम्हीं त्वरित चलावें ॥४३॥

ऐसें शूर्पणखा सांगोनि सरे ॥ तों रणतुरें वाजती गजरें ॥ भार निघाला बहु त्वरें ॥ पवनवेगें करोनियां ॥४४॥

खर तो केवळ खरमुख ॥ दूषणाचें पांढरें नाक ॥ शुभ्रकुष्ठनिःशंक ॥ दूषण नाम त्याकरितां ॥४५॥

त्रिशिराचीं शिरें तीन ॥ तीं व्हावया काय कारण ॥ त्याचे मातेनें वाणें विस्तारून ॥ तिन्हीं एकास दीधलीं ॥४६॥

त्याजकरितां तीन शिरें ॥ त्रिशिरास जाहलीं निर्धारें ॥ असो भार धांवती गजरें ॥ पंचवटीये समीप ॥४७॥

दूषणाचे पुत्र तिघेजण ॥ कपाली प्रमाथी स्थूललोचन ॥ वाटेसी जाहले अपशकुन ॥ विघ्नसूचक तेधवां ॥४८॥

सुटला अद्भुत प्रभंजन ॥ सर्वांचे धुळीनें भरले नयन ॥ रथध्वज पडला उन्मळून ॥ अपशकुन तोचि पैं ॥४९॥

रामें भार देखिला दूरी ॥ गगन गर्जे रणतुरीं ॥ नाद भरला दिशांतरीं ॥ कांपे धरित्री थरथरां ॥१५०॥

सौमित्रासी म्हणे रघुनंदन ॥ तूं आतां सीतेसी करीं जतन ॥ आज युद्ध करोनि निर्वाण ॥ वधीन दारुण राक्षसां ॥५१॥

तरी या पर्वतमस्तकीं जाण ॥ उभा राहें सीतेसहित एक क्षण ॥ आज्ञा वंदोनि लक्ष्मण ॥ चढे घेवोन जानकीतें ॥५२॥

पर्वतशिखरीं जनकनंदिनी ॥ जैसी मूळपीठीं आदिभवानी ॥ जवळी परशुराम कर जोडुनी ॥ सौमित्र ते क्षणीं तेवीं दिसे ॥५३॥

असो येरीकडे रघुनंदन ॥ धनुष्यासी चढवोनि गुण ॥ कानाडी ओढितां आकर्ण ॥ झणत्कारिती किंकिणी ॥५४॥

तों येरीकडे राक्षस ॥ सिंहनाद करिती कर्कश ॥ भोंवता वेढिला अयोध्याधीश ॥ पुराणपुरुष जगदात्मा ॥५५॥

राक्षसभारांत कडकडाट ॥ वाद्यांचा होत दणदणाट ॥ तेणें मंगळजननीचें पोट ॥ उलो पाहे ते काळीं ॥५६॥

अपार उठावले भार ॥ रणकर्कश भयंकर ॥ जैसा वृषभांनीं कोंडिला मृगेंद्र ॥ कीं द्विजेंद्र उरगांनीं ॥५७॥

कीं देखोनि दीपिकेचा रंग ॥ झेंपावती बहुत पतंग ॥ कीं वासुकी महाभुजंग ॥ मूषकीं जैसा वेष्टिला ॥५८॥

श्रीराम रणरगधीर ॥ कैसा लक्षित शत्रुभार ॥ कलशोद्भवें लक्षिला सागर ॥ सूर्यें अंधकार जैसा कीं ॥५९॥

कीं व्याघ्रें लक्षिले अजांचे कळप ॥ कीं कुठारपाणि विलोकी पादप ॥ कीं सुपर्णें लक्षिले सर्प ॥ अयोध्याधिप तेवीं पाहे ॥१६०॥

तों असुरीं ओढोनि ओढी ॥ सोडिल्या बाणांच्या कोडी ॥ कीं बैसलीसे सातवाकडी ॥ सायकांची ते वेळीं ॥६१॥

सिंहनाद करिती वेळोवेळां ॥ लोटला वाहिनीचा मेळा ॥ जैसा सागर खळबळिला ॥ प्रलयीं लोटला भूमीवरी ॥६२॥

जैशा जलदकल्लोळीं ॥ चपळा झळकती नभमंडळीं ॥ तैशा तळपती ते वेळीं ॥ असिलता सतेज ॥६३॥

शस्त्रास्त्रांचे संभार ॥ रघुपतीवरी येती अपार ॥ राक्षस म्हणती कैंचा रघुवीर ॥ खंडविखंड जाहला पैं ॥६४॥

एक म्हणती रक्तपान ॥ शूर्पणखा करील कोठून ॥ तिच्या तोंडी मृत्तिका पूर्ण ॥ पडली ऐसें वाटतसे ॥६५॥

इतुका होत शस्त्रमार ॥ परी रणरंगधीर रघुवीर ॥ ठाण न चळेचि निर्धार ॥ ऐका चतुराहो दृष्टांत ॥६६॥

हाणतां कुठार प्रहार ॥ बैसका न सांडी तरुवर ॥ कीं पर्जन्य वर्षतां अपार ॥ अचळ न चळे सर्वथा ॥६७॥

कीं निंदक निंदिती अपार ॥ न चळे साधूचें अंतर ॥ कीं प्रल्हादासी लावितां विखार ॥ परी साचार डळमळिना ॥६८॥

जयासी लाधलें अंतरसुख ॥ मग तो न मानी प्रपंचदुःख ॥ अयोध्याप्रभु तैसा देख ॥ ठाण सुरेख चळेना ॥६९॥

असो यावरी जानकीरंग ॥ ठाण मांडीत अभंग ॥ बाण सोडीत सवेग ॥ जैसे उरग पक्षांचे ॥१७०॥

आवेशें धांवती बाण ॥ जैसे सफळ तरुवर देखोन ॥ विहंगमांचे पाळे उडोन ॥ अकस्मात जेवीं येती ॥७१॥

जैसे कृषीवल एकसरें ॥ कणसें छेदिती अपारें ॥ तैसीं राक्षसांचीं शिरें ॥ अपार तेथें पाडिलीं ॥७२॥

वरी कोणी करितां हस्त ॥ ते भुजा तोडी शस्त्रासहित ॥ लक्षानुलक्ष शर सुटत ॥ चापापासून ते वेळीं ॥७३॥

श्रीरामचा तूणीर ॥ अक्षय भरलासे साचार ॥ कुंडामाजी वैश्र्वानर ॥ प्रदीप्त जैसा झांकिला ॥७४॥

कीं वासुकीचे मुखीं हळाहळ ॥ कीं सरितापतीमाजी वडवानळ ॥ कीं मेघीं विद्युल्लता तेजाळ ॥ तूणीरांत शर त्यापरी ॥७८॥

कपटी राक्षस चवदा जण ॥ रामावरी आले सरसावून ॥ अग्नीस विझवावया रंभानंदन ॥ आवेशें करून लोटला ॥७६॥

कीं वारणविदारणापुढें ॥ मार्जर दावूं आलें पवाडे ॥ कीं बृहस्पतीपुढें मूढें ॥ वाद करूं धांविन्नलीं ॥७७॥

कीं रासभांनी ब्रीदें बांधोन ॥ गंधर्वसभेसी मांडिलें गायन ॥ तैसे राक्षस चौदाजण ॥ रामावरी लोटले ॥७८॥

क्षण न लागतां रणरंगधीरें ॥ छेदिलीं चवदा जणांचीं शिरें ॥ जैशीं कां तीक्ष्ण शस्त्रें ॥ अरविंदें वीर छेदिती ॥७९॥

ऐसें देखतां वीर दूषण ॥ पुढें धांविन्नला वर्षत बाण ॥ जैसा कां वर्षत घन ॥ युद्धीं निपुण राक्षस ॥१८०॥

दूषणाचें बाणजाळ थोर ॥ रामें निवारिलें साचार ॥ जैसा उगवतां दिनकर ॥ उडुगणें जेवीं लोपती ॥८१॥

कीं अनुताप होतां अपार ॥ होय पापाचा संहार ॥ कीं वेदांतज्ञानें संसार–॥ दुःख जैसें वितुळे पैं ॥८२॥

तैसे दूषणाचे शर तोडून ॥ अश्र्वासहित तोडिला स्यंदन ॥ मग राक्षस गदा घेऊन ॥ चरणचाली धांविन्नला ॥८३॥

मग तो रावणदर्पहरण ॥ वेगें सोडी अर्धचंद्रबाण ॥ गदा हातींचीं छेदून ॥ एकीकडे पाडिली ॥८४॥

मग परिघ वीरभद्रदत्त ॥ घेऊन दूषण धांवत ॥ देव जाहले चिंताक्रांत ॥ म्हणती अनर्थ मांडला ॥८५॥

या परिघाचें निवारण ॥ केवीं करील रघुनंदन ॥ श्रीरामें काढिला दिव्य बाण ॥ वायूचें खंडण करणार जो ॥८६॥

परिघा सहित हात तेथें ॥ छेदून पाडिला रघुनाथें ॥ सवेंच एक बाण सीताकांतें ॥ चंडांशमुख काढिला ॥८७॥

दूषणाचा कंठ लक्षून ॥ विषकंठवैद्यें सोडिला बाण ॥ शिर उडविलें न लागतां क्षण ॥ पडिला दूषण ते काळीं ॥८८॥

मग दूषणाचे तिघे सुत ॥ तिहीं रण माजविलें बहुत ॥ पितयाचा सूड घेऊं यथार्थ ॥ ऐसा पुरुषार्थ धरियेला ॥८९॥

तिघेही करिती संधान ॥ राम नरवीरपंचानन ॥ बाणीं खिळिले तिघेजण ॥ परी ते आंगवण न सांडिती ॥१९०॥

बिळीं प्रवेशतां विखार ॥ अर्धे दिसती बाहेर ॥ तैसे राक्षसां अंगीं शर ॥ श्रीरामाचे खडतरले ॥९१॥

कीं पिच्छें पसरिती नीळकंठ ॥ कीं फणस फळावरी कांटे दाट ॥ तैसें बाण रुतले सघट ॥ प्रताप उद्भट रामाचा ॥९२॥

असो तिघांची शिरें रघुनाथें ॥ उडवोनि धाडिलीं निराळपंथें ॥ मग त्रिशिरा आवेशें बहुतें ॥ रामावरी लोटला ॥९३॥

रथारूढ निशाचर ॥ सोडी बहुत बाणांचा पूर ॥ तो रघुवीर तोडी जैसा समीर ॥ जलदजाळ विभांडी ॥९४॥

रघुपतीचे बाण तीक्ष्ण ॥ त्रिशिराचा छेदिला स्यंदन ॥ मग कुमारदत्त शक्ति घेऊन ॥ पिशिताशन धांविन्नला ॥९५॥

निजबाळें शक्ति झोंकली ॥ परी ते रामासी वश्य जाहली ॥ चरणांजवळ जावोनि पडली ॥ दासी तुमची म्हणोनियां ॥९६॥

रंभापर्णवत ज्या बाणाचें मुख ॥ लक्षोनि सोडी तो अयोध्यानायक ॥ त्या बाणतेजें सकळिक ॥ ब्रह्मकटाह उजळिलें ॥९७॥

त्रिशिराचीं तिन्हीं शिरें ॥ तात्काळ छेदिलीं रघुवीरें ॥ ऐसें देखोनियां खरें ॥ धांविजे त्वरें रथारूढ ॥९८॥

असंख्य बाण ते अवसरीं ॥ खरें सोडिले रामावरी ॥ श्रीराम एकला रणचक्रीं ॥ रजनीचरीं वेढिला ॥९९॥

चहूंकडोनि बाण ॥ रामावरी येती दारुण ॥ परी तितुक्यांचें संधान ॥ रघुनंदन छेदितसे ॥२०

जैसें योगेश्र्वरें मायाजाळ ॥ कीं सहस्र किरणें तममंडळ ॥ कीं अरुणानुजें सर्पकुळ ॥ विदारून सांडिजे जैसें ॥१॥

कीं शुष्कवना हुताशन ॥ भस्म करी न लागतां क्षण ॥ कीं जलदजाळ प्रभंजन ॥ विदारून सांडी जैसा ॥२॥

खरा बाण सोडित रणरंगीं ॥ अगस्तिदत्त कवच रामाचे आंगीं ॥ त्याचें बिरडें छोदोनि वेगीं ॥ खालीं पाडिलें राक्षसें ॥३॥

ऐसें विपरीत देखिलें ॥ विमानीं देव गजबजिले ॥ समस्तही चिंतूं लागले ॥ रघुवीरासी कल्याण ॥४॥

मग खरें मांडिलें निर्वाण ॥ शक्तिवरद चारी बाण ॥ सहस्राक्षही निवारण ॥ करूं न शके जयांचें ॥५॥

प्रळयींच्या चार सौदामिनी ॥ तैसे बाण सुटले ते क्षणीं ॥ परी नवल जाहलें नयनीं ॥ भूचर खेचर पाहती ॥६॥

चारी बाण तये वेळे ॥ रघुपतीच्या भातां रिघाले ॥ ब्रह्मयाचे मुखीं प्रवेशले ॥ चारी वेद जैसे कां ॥७॥

कीं चारी नद्या समुद्रांत ॥ येऊन मिळती अकस्मात ॥ कीं आनंदवनींच्या कमळांत ॥ भ्रमर चारी बैसले ॥८॥

असो देव करिती जयजयकार ॥ पुढें असिलता घेऊन खर ॥ सुरकैवारियावरी असुर ॥ चपळेऐसा धांविन्नला ॥९॥

मग चंडिशकोदंडभंजन ॥ प्रचंड दोर्दंडेंकरून ॥ सोडिला वसिष्ठदत्त बाण ॥ अनिवार अखंड जो ॥२१०॥

तेणें खराचें शिर छेदोन ॥ तत्काळ परतला दिव्य बाण ॥ श्रीराम तुणीरामाजी येऊन ॥ आपले आपण प्रवेशला ॥११॥

विजयी जाहला रघुनंदन ॥ पुष्पें वर्षती देवगण ॥ विषयकंठहृदयमखपालन ॥ निजभावेंसी पूजिला ॥१२॥

चौदासहस्र राक्षस अद्भुत ॥ त्यांत उरला नाहीं एक जिवंत ॥ रणीं एकला रघुनाथ ॥ सीता सौमित्र पाहती ॥१३॥

महाप्रलयीं सर्व निरसून ॥ एक परब्रह्म उरे निर्वाण ॥ तैसा दशकंठदर्पहरण ॥ एकला रणीं विराजे ॥१४॥

कीं सर्व निरसोनि कर्मजाळ ॥ निवृत्तितटीं संत निश्र्चळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ एकला रणीं विराजे ॥१५॥

कीं गिळोनि सर्व नक्षत्रांसीं ॥ एकला मित्र निरभ्राकाशीं ॥ त्यापरी सीतामनचकोरशशी ॥ एकला रणीं विराजे ॥१६॥

बहुत काष्ठें जाळोनि अग्न ॥ एकला उरे दैदीप्यमान ॥ त्याचपरी कौसल्यानंदन ॥ एकला रणीं विराजे ॥१७॥

शब्दध्वनि निरसुनी ॥ एकलाचि अर्थ बैसे मनीं ॥ कीं जडत्व सांडोनि धरणी ॥ क्षमारूप उरे जेवीं ॥१८॥

कीं शीतळत्व सांडोनि जळ ॥ जीवनत्व उरे निर्मळ ॥ दाहकत्व सांडोनि तेज समूळ ॥ प्रकाशरूपें उरे जैसें ॥१९॥

कीं समीरें सांडोनि चंचळपण ॥ एक पवनत्व उरे पूर्ण ॥ कीं शून्यत्व सांडोनि गगन ॥ व्यापकत्व उरे जैसें ॥२२०॥

कीं शब्दजाल निरसोनि समस्त ॥ वेदस्वरूपीं होय समाधिस्थ ॥ तैसा असुर संहारोनि रघुनाथ ॥ उभा निःशब्द उगाचि ॥२१॥

काम क्रोध आणि मत्सर ॥ हेचि त्रिशिरा दूषण खर ॥ रणीं संहारोनि समग्र ॥ निजभक्त सुखी राखिले ॥२२॥

दुर्वासना हेचि शूर्पणखा ॥ विरक्तिशस्त्रें घेवोनि देखा ॥ बोध लक्ष्मण रामसखा ॥ निर्नासिका केली तेणें ॥२३॥

आशा मनशा कल्पना ॥ भ्रांती भुली इच्छा तृष्णा ॥ त्या देखोनि बोधलक्ष्मणा ॥ पळत्या जाहल्या राक्षसी ॥२४॥

झाडलिया जैसा केर ॥ शुद्ध दिसे जेवीं मंदिर ॥ तैसें दंडकारण्य गोदातीर ॥ असुररहित जाहलें ॥२५॥

स्थूळ लिंग आणि कारण ॥ निरसोनि उरे शुद्ध ज्ञान ॥ तैसें जनस्थानीं ब्राह्मण ॥ सुखें नांदों लागले ॥२६॥

ब्राह्मण मारतील म्हणोनी शूर्पणखा घेऊन राक्षसिणी ॥ भेणें पळाली तेथूनि ॥ लंकेस जाऊन शंख करी ॥२७॥

सेवक सांगती दशमुखा ॥ निर्नासिकी जाहली शूर्पणखा ॥ शंख करी तेणें लंका ॥ दुमदुमली समग्र ॥२८॥

मग तीस पाचारोन रावण ॥ एक तीं पुसे वर्तमान ॥ ती म्हणे राम लक्ष्मण ॥ जनस्थानीं आलेरे ॥२९॥

लक्ष्मणें गौरविलें मजलागुनी तुझी भगिनी म्हणोनी ॥ त्रिशिरा खर दूषण समरंगणी ॥ सहपरिवारें वधियेले ॥२३०॥

शंबरीस वधोन सवेग ॥ सौमित्रें नेले काळखड्ग ॥ चालो लागले सन्मार्ग ॥ याग जप तप आणि व्रतें ॥३१॥

गोदातीर जनस्थान ॥ तेथें सुखें नांदती ब्राह्मण ॥ अखंड करिती वेदाध्ययन ॥ निःशंक पूर्ण सर्वदा ॥३२॥

आतां तुझी लंका घेऊन ॥ हेही ब्राह्मणासी देईल दान ॥ जळो तुझी आंगवण ॥ कासयाय वदन दाविसी ॥३३॥

तुझ्या उरावरी धनुष्य पडिलें ॥ तें क्षणमात्रें रामें भंगिलें ॥ तेव्हांच तुझें काळें वदन जाहलें ॥ सकळ रायां देखतां ॥३४॥

सीतेसारखी नोवरी ॥ नाहीं ब्रह्मांडमंडपामाझारी ॥ ते हातींची दवडोनि निर्धारीं ॥ पळोन येथें आलासी ॥३५॥

तरीच तुझा पुरुषार्थ जनीं ॥ जरी सीता आणिसी हिरोनी ॥ तिचें सौंदर्य रूप पाहोनी ॥ वनचरेंही भुलती ॥३६॥

ऐसी शूर्पणखा अनुवादली ॥ मग तें रावणे संबोखिली ॥ तेव्हां मनामाजी ते वेळीं ॥ युक्ति सुचविता पैं जाहला ॥३७॥

म्हणे मृगवेष धरूनि निर्मळ ॥ पाठवूं मारीच मातुळ ॥ मृग वधाया तत्काळ ॥ काकुत्स्थ जाईल वनातें ॥३८॥

मग आणूं जानकी दिव्यरत्न ॥ ऐसें विचारी द्विपंचवदन ॥ असो इकडे जानकी लक्ष्मण ॥ पर्वताखालीं उतरलीं ॥३९॥

सद्रद होवोनि जनकनंदिनी ॥ मिठी घाली राघवचरणीं ॥ म्हणे धन्य लीला दाखविली नयनीं ॥ अतर्क्य करणी वेदशास्त्रां ॥२४०॥

जाहले उदंड अवतार ॥ परी कोणाचे परतले नाहीं शर ॥ तों ऋषि धांवले समग्र ॥ श्रीरामचंद्र वेष्टिला ॥४१॥

म्हणती कौसल्यागर्भरत्ना ॥ जलदगात्रा शतपत्रनयना ॥ ताटिकांतका मखपाळणा ॥ भवमोचना भवहृदया ॥४२॥

जयजयकार करिती ऋषीश्र्वर ॥ पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर ॥ अभंगविजयी श्रीधर ॥ शरयु तीरविहारी जो ॥४३॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥

चतुर्दशाध्याय गोड हा ॥

श्रीरामविजयअध्याय १५ वा

श्रीगणेशाय नमः

भवाब्धि भरला परम तुंबळ ॥ द्वैतभावाचे तटाक सबळ ॥ कुबुद्धीचे कल्लोळ ॥ मोहजाळ असंभाव्य ॥१॥

मद मत्सर थोर आवर्त ॥ कामक्रोधादि मासे अद्भुत ॥ आशा तृष्णा भ्राति तेथ ॥ मगरी थोर तळपती ॥२॥

लोभ द्वेष नक्र थोर ॥ ममतेच्या लाटा अति दुस्तर ॥ दंभ आणि अहंकार ॥ विरोळे हे तळपती ॥३॥

अविवेक किरवे तत्वतां ॥ अविद्या भ्रांति जळदेवता ॥ पीडिती त्रिभुवनींच्या जीवां समस्तां ॥ इच्छा ममता कल्पना ॥४॥

 

ऐसा अगाद्य भवनिधी थोर ॥ तेथें रामकथाजहाज सुंदर ॥ शिल्पिकार वाल्मीक ऋषीश्र्वर ॥ तारूं तेणें निर्मिलें ॥५॥

नाना चरित्रें सुंदर ॥ याचि फळ्या दृढ थोर ॥ विवेकें जोडूनि समग्र ॥ अभेदत्व साधिलें ॥६॥

साहित्य लोह तगटबंध ॥ आनंदपदखिळे विविध ॥ दृष्टांतदोरे प्रसिद्ध ॥ ठायीं ठायीं आंवळिले ॥७॥

अर्थरस तेल निखिळ ॥ तेणें सांधे बुजिले सकळ ॥ रामप्रतापस्तंभ विशाळ ॥ कीर्तिशीड फडकतसे ॥८॥

सप्त कांडें सप्त खण ॥ लोटीत भावप्रभंजन ॥ निजबोध कर्णधार पूर्ण ॥ सकळ सुजाण देखणा ॥९॥

ज्ञान वैराग्य भक्ति ॥ हेचि आवले आवलिती ॥ या जहाजावरी तेचि बैसती ॥ अद्भुत ग्रंथी पुण्य ज्यांचें ॥१०॥

रामनामघोष थोर ॥ हेचि यंत्रांचे भडिमार ॥ नादें जलचरें समग्र ॥ भयभीत पळताती ॥११॥

ऐसें भवसागरीं तारूं थोर ॥ गुरुकृपेचें केणें अपार ॥ भरूनि मोक्षा द्वीपांतर ॥ लागवेगें पाविजे ॥१२॥

तरी तुम्हीं श्रोते सज्जन ॥ या जहाजावरी बैसोन ॥ भवाब्धि हा उल्लंघून ॥ निवृत्तितटा जाइंजे ॥१३॥

असो चौदावे अध्यायीं कथन ॥ वधिले त्रिशिरा खर दूषण ॥ शूर्पणखेनें वर्तमान ॥ दशकंठासी श्रुत केलें ॥१४॥

श्रीरामप्रताप अद्भुत ॥ ऐकतां सचिंत लंकानाथ ॥ सद्भक्ताची स्तुति ऐकोनि समस्त ॥ दुर्जन जैसे क्षोभती ॥१५॥

पतिव्रतेची ऐकोनि राहाटी ॥ जारिणी होती जेवी कष्टी ॥ कीं मृगेंद्रगर्जना ऐकतां पोटीं ॥ वारण जैसे दचकती ॥१६॥

कीं विष्णुमहिमा ऐकतां अद्भुत ॥ क्रोधावती जैसे दैत्य ॥ असो ते वेळे मयजाकांत ॥ मारीचगृहीं प्रवेशला ॥१७॥

मारीचानें सन्मान देऊनी ॥ रावणातें बैसविलें आसनीं ॥ याउपरी मधुरवचनीं ॥ दशकंठ बोलता जाहला ॥१८॥

म्हणे पंचवटीस आला रघुनंदन ॥ मारिले त्रिशिरा खर दूषण ॥ शूर्पणखा विटंबून ॥ शंबरीही मारिला ॥१९॥

शत्रु नाग कृशान ॥ हे म्हणों नयेत लहान ॥ क्षणें हरतील प्राण ॥ सावधान असावें ॥२०॥

यालागीं मातुळा परियेस ॥ तुवां धरावा मृगवेष ॥ पंचवटीस जाऊन राघवास ॥ भुलवोनियां नेइंजे ॥२१॥

राघव नेइंजे दूर वनीं ॥ मग पद्माक्षी आणीन काढूनि ॥ हें कार्य साधल्या तुजलागोनी ॥ गौरवीन बहुसाल ॥२२॥

जैसें मृढाचें वाग्जाळ ॥ पंडित छेदी तत्काळ ॥ तैसीं वचनें रसाळ ॥ बोले मातुळ रावणाचा ॥२३॥

पूर्वीं करितां यागरक्षण ॥ सुबाहु टाकिला मारून ॥ त्या बाणवातेंकरून ॥ मी पडलों सागरीं ॥२४॥

वीस कोटी मारिले पिशिताशन ॥ तो रामप्रताप आठवून ॥ मारीच मूर्च्छा येऊन ॥ करी रावण सावध तया ॥२५॥

मारीच म्हणे रावणा ॥ अभिलाषितां परांगना ॥ तो मुकला आपुलिया प्राणा ॥ सत्य जाण निर्धारें ॥२६॥

सद्विवेक हृदयीं धरोन ॥ अनुचित कर्मीं न घालीं मन ॥ सद्रुरु सांगे ते वचन ॥ अवश्य हृदयीं धरावें ॥२७॥

न करावें कोणाचें हेळण ॥ कदा न बोलिजे दुष्ट वचन ॥ पराची वेदना जाणून ॥ परोपकार करावा ॥२८॥

सर्वांभूतीं एक भगवंत ॥ हा वेदशास्त्रीं श्रेष्ठार्थ ॥ म्हणोनि द्वेष न करावा सत्य ॥ साधिजे परमार्थ अवश्य ॥२९॥

क्षणिक जाणोनि शरीर ॥ साधावा सारासारविचार ॥ मी भाग्यें ज्ञानें बहु थोर ॥ हा अभिमान न धरावा ॥३०॥

काम क्रोध मद मत्सर ॥ हे शत्रु जिंकावे अनिवार ॥ दशमुखा तूं सज्ञान थोर ॥ सखा रघुवीर करीं वेगें ॥३१॥

सखा करीतां चापपाणी ॥ मग सुखासी नाहीं वाणी ॥ जोंवरी शशी आणि तरणी ॥ तोंवरी सुखें नांदसी ॥३२॥

राम केवळ परम पुरुष ॥ आदिनारायण सर्वेश ॥ तुझे उरावरी पडलें धनुष्य ॥ सीतास्वयंवरीं आठवीं कां ॥३३॥

तुझे चालिले जेव्हां प्राण ॥ मग उठिला रामपंचानन ॥ चंडीशकोदंड भंगोन ॥ जीवदान तुज दिधलें ॥३४॥

तैं तुज रामें वांचविलें ॥ त्याचें काय हेंचि फळ जाहलें ॥ जेणें उपकार बहुत केले ॥ त्यासी मारिसी शस्त्र घेऊनि ॥३५॥

जेणें पाजिला सुधारस ॥ त्यासीच पाजिलें महाविष ॥ जेणें रणींहून सोडविलें निःशेष ॥ त्याचिया गृहास अग्नि लाविसी ॥३६॥

जन्मूनि जेणें केलें पाळण ॥ आपत्काळीं रक्षिलें पूर्ण ॥ तो निद्रिस्थ असतां पाषाण ॥ कैसा वरी घालावा ॥३७॥

नौका बुडतां कांसे लाविलें ॥ कीं जळत्या गृहींहून काढिलें ॥ कीं शिर छेदितां सोडविलें ॥ तो पितयातुल्य वेद म्हणे ॥३८॥

यालागीं दशकंठा तूं सुबुद्ध ॥ रामाशीं न करावा विरोध ॥ राम केवळ ब्रह्मानंद ॥ आनंदकंद जगद्रुरु ॥३९॥

तुझा स्वामी जो शंकर ॥ तोही रामभजनीं सादर ॥ ते रामभार्या तूं पामर ॥ हिरोनी आणूं इच्छितोसी ॥४०॥

ऐसीं मातुळाचीं वचनें ॥ सुधारसाहूनि गोड गहनें ॥ कीं विवेकवैरागरींची रत्नें ॥ रावणाहातीं दीधलीं ॥४१॥

परम मतिमंद कुल्लाळ देख ॥ परीक्षा नेणेंचि महामूर्ख ॥ रोगिष्ठापुढें अन्नें सुरेख ॥ व्यर्थ जैशीं वाढिलीं ॥४२॥

अवदान समर्पिलें भस्मांत ॥ कीं उकिरडां ओतिलें अमृत ॥ कीं जो मद्यपानी उन्मत्त ॥ त्यास परमार्थ कायसा ॥४३॥

असो परम क्रोधायमान ॥ रावण तेव्हां बोले तीक्ष्ण ॥ जैसें साधूचें छळण ॥ निंदक करी साक्षेपें ॥४४॥

माझिया प्रतापापुढें ॥ राम मनुष्य काय बापुडें ॥ मी केलीं चूर्ण देवांचीं हाडें ॥ तुज देखतां समरांगणीं ॥४५॥

त्याचा प्रताप तूं वानिसी ॥ तरी तुज वधीन निश्र्चयेंसीं ॥ म्हणोनि हस्त घातला शस्त्रासी ॥ मारीच मानसीं वीटला ॥४६॥

म्हणे अधम तूं परम दुर्जन ॥ होय माघारा न बोलें वचन ॥ मी आतां मृगवेष धरून ॥ जातों शरण राघवेंद्रा ॥४७॥

रामबाणें होतां मरण ॥ मी अक्षयसुख भोगीन ॥ तुझे हातेंकरून ॥ अधःपतन पतिता ॥४८॥

आतां पंचवटीस चला लौकरी ॥ मग दोघे बैसोनि रथावरी ॥ वायुवेगें ते अवसरीं ॥ जनस्थानासी पातले ॥४९॥

वनीं उभा गुप्त रावण ॥ मारीच निघे मृगवेष धरून ॥ अंतरीं करीत रामस्मरण ॥ म्हणे धन्य धन्य आजि मी ॥५०

आला चमकत पंचवटीं ॥ श्रीरामरूप न्याहाळी दृष्टीं ॥ हृदयीं झाला परम संतुष्टी ॥ अंतरीं कष्टी नव्हेची ॥५१॥

जैसें सुवर्णतगट सुरंग ॥ तैसें मृगाचें दिसे अंग ॥ ऐसें देखतां सीतारंग ॥ हात घाली धनुष्या ॥५२॥

मृग क्षणक्षणां परतोन ॥ पाहे राघवाकडे विलोकून ॥ तों ते पद्माक्षी बोले वचन ॥ पद्मजातजनकाप्रती ॥५३॥

म्हणे ऐसा मृग आजिपर्यत ॥ आम्हीं देखिला नाहीं यथार्थ ॥ याचे त्वचेची कंचुकी सत्य ॥ उत्तम होईल केलिया ॥५४॥

अयोध्येसी प्रवेश करितां ॥ ते कंचुकी लेईन प्राणनाथा ॥ षण्मास उरले आतां ॥ मनुसंवत्सरांमाजीं पैं ॥५५॥

सीतेची इच्छासरिता साचार ॥ कर्मजळाचा तुंबळ पूर ॥ दुःखसमुद्राप्रति साचार ॥ भेटावया जाऊं पाहे ॥५६॥

जाणूनि जानकीचें मानस ॥ आणि पुढील होणार भविष्य ॥ सत्वर चालिला अयोध्याधीश ॥ धनुष्यासी बाण लावूनियां ॥५७॥

म्हणे सौमित्रा सावधान ॥ रक्षीं जानकीचिद्रत्न ॥ परम कपटी पिशिताशन ॥ नसतींच विघ्नें करितील ॥५८॥

असों गुंफेत सीता च्रिद्रत्न ॥ द्वारीं रक्षपाळ लक्ष्मण ॥ जैसा महाभुजंग अनुदिन ॥ निधानकुंभ रक्षीतसे ॥५९॥

पार्वतीजवळ जैसा कुमार ॥ कीं इंदिरेपाशीं खगेश्र्वर ॥ तैसा तो भूधरावतार ॥ रक्षी द्वार गुंफेचें ॥६०॥

इकडे मृगाचे पाठी लागे ॥ राघव जात वातवेगें ॥ गौतमीतीराच्या पूर्वमार्गें ॥ केलें मृगें पलायन ॥६१॥

मनाहून वेग अत्यंत ॥ मनमोहन त्वरें जात ॥ घ्वजवज्ररेखांकित ॥ पदें उमटत धरेवरी ॥६२॥

पद्मोद्भव आणि भोगींद्र ॥ नीलग्रीव आणि वज्रधर ॥ चरणरज इच्छिती निरंतर ॥ दुर्लभ साचार तयांसी ॥६३॥

असो मृगाचें वर्म लक्षून ॥ रामें सोडिला दिव्य बाण ॥ भूमीवरी पडिला हरिण ॥ अचुक संधान रघुपतीचें ॥६४॥

सादर पाहे रघुवीर ॥ तों पडलें राक्षसाचें शरीर ॥ श्रीरामबाणें निशाचर ॥ पावला परत्र निर्धारें ॥६५॥

आश्र्चर्य करी अयोध्याधीश ॥ म्हणे परम कपटी राक्षस ॥ असो अश्र्वत्थाखालीं पुराणपुरुष ॥ श्रमोनियां बैसला ॥६६॥

इकडे काय जाहलें वर्तमान ॥ वनीं गुप्त उभा रावण ॥ गुंफेद्वारीं लक्ष्मण ॥ बैसला रक्षणा अव्यग्र ॥६७॥

शांतीजवळी परमार्थ ॥ कीं तपासी रक्षी सुचित्व ॥ तैसा द्वारीं सुमित्रासुत ॥ मग लंकानाथ काय करी ॥६८॥

श्रीरामासारखा शब्दध्वनी ॥ राक्षसें उठविला काननीं ॥ सौमित्रा धांव धांव म्हणोनी ॥ सीता कर्णीं आईकत ॥६९॥

सौमित्रा धांव धांव लौकरी ॥ वनीं वेष्टिलें रजनीचरीं ॥ संकट पडलें मजवरी ॥ तूं कैवारी पाठिराखा ॥७०॥

रणभूमीस बंधूविण ॥ उडी घालील सांग कवण ॥ राक्षसी घेतला माझा प्राण ॥ मग येऊन काय पाहसी ॥७१॥

ऐसें ऐकतां जनकनंदिनी ॥ परम घाबरली अंतःकरणीं ॥ म्हणे श्रीराम माझा पडिला वनीं ॥ करुणवाणी बाहती तुम्हां ॥७२॥

रणीं बंधु संकटी मित्र ॥ वृद्धापकाळीं ओळखिजे कलत्र ॥ विषमकाळीं सत्वपुत्र ॥ सांभाळिती पितयातें ॥७३॥

कीं शस्त्रमार होता अत्यंत ॥ करींचें वोडण पुढें होत ॥ कीं संसारतापें संतप्त ॥ साधु निववीत निजबोधें ॥७४॥

मग बोले लक्ष्मण ॥ जानकी हें कापट्यवचन ॥ संकटीं पडले रघुनंदन ॥ हे कल्पांतींही घडेना ॥७५॥

तो देवाधिदेव रघुत्तम । चराचरबीज सुफलांकित द्रुम ॥ त्यासी संकट पडेल दुर्गम ॥ हें कल्पांतींही घडेना ॥७६॥

जरी तमें झांकेल चंडांश ॥ जरी शीतज्वर बाधेल अग्नीस ॥ जगद्भक्षक काळास ॥ भूतबाधा जरी होय ॥७७॥

ऊर्णनाभीचे तंतूनें सहज ॥ जरी बांधिजेल महागज ॥ तरी संकटीं पडेल रघुराज ॥ जनकतनये जाण पां ॥७८॥

ऐसें बोलतां लक्ष्मण ॥ सीता जाहली क्रोधायमान ॥ तीक्ष्ण शब्दशस्त्रेंकरून ॥ लक्ष्मणासी ताडिलें ॥७९॥

म्हणे तुमचे कळलें बंधुपण ॥ ओळखिली म्यां मनींची खूण ॥ माझा अभिलाष धरून पूर्ण ॥ काननाप्रति आलासी ॥८०॥

राम राक्षसीं वधिलिया वनीं ॥ मग करूं इच्छिसी मातें पत्नी ॥ जैसा मैंद क्षमा धरूनि ॥ सेवा करी साक्षेपें ॥८१॥

सन्मुख देखोनि रघुनाथा ॥ म्हणसी जानकी जगन्माता ॥ कीं वनीं राम वधावया तत्वतां ॥ तुज कैकयीनें धाडिलें ॥८२॥

तूं दायाद परम दुर्जन ॥ सापत्नबंधु कपटी पूर्ण ॥ जळो तुझें काळें वदन ॥ कळलें ज्ञान वैराग्य तुझें ॥८३॥

रघुपतीस विपरीत होतां ॥ प्राण त्यजीन हा तत्वतां ॥ निर्दय पाहतां तुजपरता ॥ भुवनत्रयीं दिसेना ॥८४॥

माझा अभिलाष धरून ॥ रामासी इच्छितोसी मरण ॥ ऐसे जानकीनें वाग्बाण ॥ सौमित्रावरी सोडिले ॥८५॥

कीं तप्तशस्त्रांचे घाय पूर्ण ॥ त्याहूनि बोल ते तीक्ष्ण ॥ कीं पर्वताचे कडे जाण ॥ अंगावरी कोसळले ॥८६॥

वचनें नव्हेत तीं निश्र्चित ॥ कीं दुःखवल्लीचीं फळें यथार्थ ॥ परम दुःखी सुमित्रासुत ॥ प्रत्युत्तर देतसे ॥८७॥

म्हणे माते जनकनंदिनी ॥ मी निष्पाप बोलिलों वाणी ॥ कीं विजयी सदा चापपाणी ॥ दुःख वनीं त्यासी कैंचें ॥८८॥

पृथ्वी आप तेज वायु आकाश ॥ तुज मज साक्ष चंडांश ॥ मी बोलिलों निर्दोष ॥ जैसें कां यश सोज्वळ ॥८९॥

मी बाळक तूं जननी ॥ हाचि भावार्थ माझे मनीं ॥ तुझी तुज फळेल करणी ॥ पडसी बंधनीं षण्मास ॥९०॥

पुनः भेटे जों रघुनाथ ॥ तो भोगिसी महा अनर्थ ॥ ऐसें बोलोनि सुमित्रासुत ॥ चालिला त्वरित वनासी ॥९१॥

मग तो उर्मिलाप्राणनाथ ॥ जनकाचा कनिष्ठ जामात ॥ गुंफेद्वारीं रेखा ओढित ॥ धनुष्यकोटीनें तेधवां ॥९२॥

म्हणे तूं या रेखेबाहेर जासी ॥ तरी परम अनर्थ पावसी ॥ जो रघुवीर अयोध्यावासी ॥ त्याचीच शपथ तुज असे ॥९३॥

शोधीत घोर अरण्य ॥ सौमित्र जातां करी रुदन ॥ म्हणे होतांचि रामदर्शन ॥ प्राण त्यागीन निर्धारें ॥९४॥

श्रीरामपदांकित मुद्रा दिसत ॥ ध्वजवज्रादि चिन्हें मंडित ॥ मार्ग काढित सुमित्रासुत ॥ ऐका दृष्टांत येथें कैसा ॥९५॥

जैसे श्रुतीच्या आधारें निश्र्चित ॥ स्वस्वरूपीं प्रवेशती संत ॥ त्याचपरी सुमित्रासुत ॥ श्रीरघुनाथा पाहोंजाय ॥९६॥

कीं संसारतापें संतप्त पूर्ण ॥ तो सद्रुरूसी जाय शरण ॥ कीं तृषित जान्हवी लक्षून ॥ जात धांवोन त्वरेनें ॥९७॥

तैसा सत्वर जात लक्ष्मण ॥ तों अश्र्वत्थाखालीं मनमोहन ॥ श्यामसुंदर दैदीप्यमान ॥ मखपाळण बैसला असे ॥९८॥

कोमाइलें श्रीरामवदन ॥ तों येतां देखिला लक्ष्मण ॥ शोकें दिसे दीनवदन ॥ येऊन लोटांगण घातलें ॥९९॥

कंठ जाहला सद्रदित ॥ नयनीं आले अश्रुपात ॥ श्रीरामचरण क्षाळित ॥ पाहे तटस्थ रघुवीर ॥१००॥

श्रीराम म्हणे लक्ष्मणा ॥ कां सीता टाकोनि आलासी वना ॥ येरू म्हणे रघुनंदना माझा वध करीं वेगीं ॥१॥

ऐसें वाटे माझे मनीं ॥ देह समर्पावा रामचरणीं ॥ रामें हृदयीं आलिंगूनी ॥ कायसा मनीं खेद सांगें ॥२॥

सौमित्र सद्रदित होऊनि बोले ॥ सीतेनें वाग्बाण सोडिले ॥ तेणें सर्वांग माझें खोचलें ॥ तें बोलिलें नवजाय ॥३॥

मग बहुत प्रकारेंकरून ॥ समाधान करी रघुनंदन ॥ तैसेच परतले दोघेजण ॥ आश्रमपंथ लक्षोनियां ॥४॥

इकडे कथानक काय जाहलें ॥ मागें दशग्रीवें काय केलें ॥ रूप अतिथाचें धरिलें ॥ कापट्य करोनि ते वेळे ॥५॥

जानकी चंद्रमंडळ सुंदर ॥ तेथें राहू आला दशकंधर ॥ उभा राहिला रेखेबाहेर ॥ दुराचार पापात्मा ॥६॥

कीं हरिणी देखोनि सुकुमार ॥ न्यावया झेंपावें जेवीं व्याघ्र ॥ तैसा राक्षस रेखेबाहेर ॥ अतीथवेषें उभा असे ॥७॥

रावण परम भयभीत ॥ रेखा नुल्लंघवे यथार्थ ॥ जैसा वडवानळ अद्भुत ॥ शलभ ओलांडूं शकेना ॥८॥

पुढें उभा दशमुख ॥ परी जानकी निर्भय निःशंक ॥ जैसा महेशापुढें मशक ॥ तैसा दशमुख उभा असे ॥९॥

इंद्रापुढें जैसा रंक ॥ ज्ञानियापुढें महामूर्ख ॥ कीं केसरीपुढें जंबुक ॥ कीं सूर्यापुढें खद्योत पैं ॥११०॥

कीं अग्नीपुढें पतंग ॥ कीं खगेंद्रापुढें उरग ॥ कीं राजहंसासमोर काग ॥ तैसा उभा खळ तेथें ॥११॥

कीं नामापुढें पाप देख ॥ कीं वेदापुढें चार्वाक ॥ कीं शंकरापुढें मशक ॥ मीनकेतन जेवीं दिसे ॥१२॥

कीं पंडितापुढें अजापाळक ॥ कीं श्रोतियापुढें हिंसक ॥ कीं वासुकीपुढें मंडूक ॥ लक्षण पाहूं पातला ॥१३॥

कीं अग्नीपुढें जैसें तृण ॥ कीं ज्ञानापुढें अज्ञान ॥ कीं महावातापुढें जाण ॥ जलदजाळ जैसें कां ॥१४॥

तैसा सीतेपुढें रावण ॥ न्याहाळोनि पाहे तिचें वदन ॥ मनीं म्हणे ऐसें निधान ॥ त्रिभुवनामाजीं दिसेना ॥१५॥

जगन्माता आदिशक्ती ॥ तिचा अभिलाष धरितां चित्तीं ॥ अवदसा आली रावणाप्रती ॥ झोळी हातीं घेतली ॥१६॥

कामधेनु अभिलाषितां जाण ॥ क्षय पावला सहस्रार्जुन ॥ जालंदर पार्वतीलागून ॥ अभिलाषितां भस्म जाहला ॥१७॥

तृणाचे वळईमाजी देखा ॥ कैसी उगी राहे दीपकलिका ॥ तैसें वाटे दशमुखा ॥ स्पर्श कदा न करवे ॥१८॥

कापुराचा पुतळा ॥ केंवीं गिळील अग्निज्वाळा ॥ तैसे न स्पर्शवे जनकबाळा ॥ रावणाचेनि सर्वथा ॥१९॥

सीतेप्रति पुसतसे रावण ॥ ये वनीं तूं कोणाची कोण ॥ कां सेविलें घोर विपिन ॥ काय कारण पुढे असे ॥१२०॥

मग जगन्माता बोले वचन ॥ अयोध्याप्रभु रघुनंदन ॥ मी त्याची ललना पूर्ण ॥ कन्यका जाण जनकाची ॥२१॥

चंडीश कोदंड दारुण ॥ रामें भंगिलें न लागतां क्षण ॥ जो रावणबळदर्पहरण ॥ मखरक्षण ताटिकांतक ॥२२॥

पाळावया पितृवचन ॥ वनासी आले रघुनंदन ॥ शूर्पणखेसी विटंबून ॥ त्रिशिरा खर दूषण मारिले ॥२३॥

आतां रावण आणि कुंभकर्ण ॥ या दोघां दुष्टांतें वधून ॥ बंदीचे वृंदारक सोडवून ॥ अयोध्येसी मग जाऊं ॥२४॥

वना गेले रामलक्ष्मण ॥ ते आतां येतील न लागतां क्षण ॥ तोंवरी बेसावें आपण ॥ स्वस्थ मन करोनियां ॥२५॥

स्वहस्तेंकरूनि जाण ॥ तुम्हांसी पूजिती रघुनंदन ॥ नावेक बैसावें म्हणोन ॥ तृणासन घातलें ॥२६॥

भयभीत लंकानाथ ॥ प्रवेश न करवे गुंफेआंत ॥ सीता बाहेर न ये सत्य ॥ चापरेखा उल्लंघोनी ॥२७॥

अतीथ म्हणे हें राक्षसवन ॥ तूं एकली येथें कामिन ॥ बहुतेक आहेस राक्षसीण ॥ आंत नेऊन गिळीसी मज ॥२८॥

त्वां आसन घातलें गुंफेत ॥ तरी मी आंत न ये यथार्थ ॥ मज तूं खासी हे निश्र्चित ॥ कळलें मत सर्व तुझें ॥२९॥

सीता म्हणे शिर हर हर ॥ आम्ही राक्षस नव्हे जी साचार ॥ असों अतीथाचे किंकर ॥ सत्य निर्धार जाणपां ॥१३०॥

रावण विचारीं अंतरीं ॥ ही नयेचि गुंफेबाहेरी ॥ मग मूर्च्छा येऊन उर्वीवरी ॥ लटिकाची पडियेला ॥३१॥

म्हणे आतां फलाहाराविण ॥ माझा जातो येथें प्राण ॥ तूं गुंफेबाहेर येऊन ॥ वदनीं माझ्या फळ घालीं ॥३२॥

तों गुप्तरूपें देव समस्त ॥ जगन्मातेचें स्तवन करित ॥ तूं लंकेस जाऊन त्वरीत ॥ बंधमुक्त करी आम्हां ॥३३॥

तुज स्पर्शतांचि रावण ॥ भस्म होईल न लागतां क्षण ॥ मग आम्हांस बंदीहून ॥ सर्वथा कोणी न सोडवी ॥३४॥

तुझें करोनि निमित्त ॥ लंकेस येईल रघुनाथ ॥ तरी मुख्यरूप अग्नींत ॥ करीं गुप्त जननीये ॥३५॥

तुझें प्रतिबिंब स्वरूप जाण ॥ स्वयें नटेल हुताशन ॥ रावणवंश भस्म करून ॥ कार्यसिद्धि करील तो ॥३६॥

तरी मुख्यरूप गुप्त व्हावें ॥ छायारूप तेथें जावें ॥ ऐसें देव विनविती आघवे ॥ अवश्य म्हणे जानकी ॥३७॥

असो इकडे रावण ॥ म्हणे धांव धांव जातो प्राण ॥ मग जगन्माता फळें घेऊन ॥ रेखेजवळ पातली ॥३८॥

भिक्षा घालावयासी कर ॥ सीतेनें केला रेखेबाहेर ॥ तैसीच ओढोनियां सत्वर ॥ निशाचरें उचलिली ॥३९॥

आपलें स्वरूप लंकेश ॥ दाविता झाला जानकीस ॥ म्हणे म्यां बंदीं घातले त्रिदश ॥ वरीं निःशंक मज आतां ॥१४०॥

सीतेलागीं आलिंगीन ॥ ऐसें मनीं भावी रावण ॥ सीता म्हणे जाशील भस्म होऊन ॥ न लागतां क्षण आतांचि ॥४१॥

अग्नीस ओळंबा केवीं लागे ॥ पतंग नुरे दीपासंगें ॥ तुझा मृत्यु जवळी वेगें ॥ आला जाण राक्षसा ॥४२॥

रामपंचाननाची वस्तु पूर्ण ॥ जंबुका तूं नेतोसी चोरून ॥ जैसें अन्नसदनीं रिघे श्र्वान ॥ तैसा जाण तूं दशमुखा ॥४३॥

खदिरांगारासी वृश्र्चिक ॥ पुच्छ हाणूं जातां देख ॥ तैसा तूं भस्म होसी निःशंक ॥ सोडी मज राक्षसा ॥४४॥

परी न सोडीच रावण ॥ घातली रथावरी नेऊन ॥ गुंफेभोंवतीचें ब्राह्मण ॥ ते भयेंकरून पळाले ॥४५॥

गृहस्थासी पडतां विषमकाळ ॥ आश्रित पळती जैसे सकळ ॥ तैसे ब्राह्मण रानोमाळ ॥ भयेकरून पळताती ॥४६॥

सीता जाहली दीनवदन ॥ म्हणे कोठें रामलक्ष्मण ॥ करुणास्वरे हांक फोडून ॥ धांवा करी राघवाचा ॥४७॥

तों निराळमार्गें रथ ॥ पळवीत जाय लंकानाथ ॥ दीर्घस्वरें आक्रंदत ॥ जनकदुहिता ते काळीं ॥४८॥

नानावृक्षवनरांप्रति ॥ हांक फोडून सीता सती ॥ म्हणे सत्वर सांगा रघुपती ॥ राक्षस नेतो म्हणोनियां ॥४९॥

सीतेची करुणा देखोन ॥ पशु पक्षी करिती रुदन ॥ वृक्ष आणि पाषाण ॥ दुःखेंकरून उलताती ॥१५०॥

सीता म्हणे श्रीरामा ॥ अपर्णावरमनविश्रामा ॥ पद्मजातजनका पूर्णब्रह्मा ॥ धांवें आतां लौकरी ॥५१॥

हे ताटिकांतका रघुवीरा ॥ हे मखपाळका समरधीरा ॥ अहल्योद्धारा परम उदारा ॥ धांवें सत्वर ये वेळे ॥५२॥

रावण हा सर्प दारुण ॥ जिव्हारीं झोंबला जातो प्राण ॥ तूं सुर्पणवहना गारुडी पूर्ण ॥ झडप घालोनि पावें वेगीं ॥५३॥

रावण नव्हे हा सबळ मातंग ॥ पंचानना धांव तूं सवेग ॥ वियोगानळें जाळिलें सर्वांग ॥ करुणाघन वर्षें तूं ॥५४॥

जो परम साधु सुमित्रासुत ॥ पवित्र जैसा केवळ आदित्य ॥ त्यासी छळितां रघुनाथ ॥ मज अंतरला आतांचि ॥५५॥

जो करील साधूचे छळण ॥ नसतेंच ठेवी त्यासी दूषण ॥ तरी जन्मोजन्मीं वंशखंडण ॥ नरक दारुण भोगील तो ॥५६॥

साधुछळक दुराचारी ॥ त्याचे भारें कांपे धरित्री ॥ ईश्र्वर सर्व दोष क्षमा करी ॥ तारी भवसागरीं पतिता ॥५७॥

परी पतित जो संतछळक ॥ त्यासी दुःखें भोगवी अनेक ॥ त्या दुष्टाचें न पहावें मुख ॥ पापी निष्टंक साधुद्रोही ॥५८॥

दरिद्र दुःख विघ्नें बहुत ॥ त्यावरीच कोसळती समस्त ॥ सध्यां मजचि आला प्रचीत ॥ राक्षस नेत धरोनियां ॥५९॥

जानकीचे विलाप ऐकोन ॥ चराचर जीव करिती रुदन ॥ जटायु धांविन्नला देखोन ॥ क्षोभला पूर्ण काळ जैसा ॥१६०॥

काया थोर गिरिसमान ॥ वज्रचंचू परम तीक्ष्ण ॥ तिखट नखें विद्रुमवर्ण ॥ रावणावरी कोसळला ॥६१॥

जटायु म्हणे रे दुर्जना ॥ महानिष्ठुरा खळा मलिना ॥ सांडीं वेगीं श्रीरामललना ॥ नाहीं तरी प्राणा मुकशील ॥६२॥

दीपाचे पोटीं होय काजळ ॥ तैसा तूं ब्रह्मवंशीं चांडाळ ॥ तुझें छेदिन शिरकमळ ॥ सांडीं वेल्हाळ जानकी ॥६३॥

कासया केलें वेदाध्ययन ॥ काय कोरडें ब्रह्मज्ञान ॥ जळो तुझें तपाचरण ॥ शिवभजन व्यर्थ गेलें ॥६४॥

जो जगवंद्य जगदुद्धार ॥ त्याची वस्तु नेसी तूं तस्कर ॥ तुझें कर्ण नासिक समग्र ॥ छेदोनि आजि टाकीन ॥६५॥

असो धनुष्य घेऊन रावण ॥ जटायूवरी सोडी बाण ॥ येरू चंचुघातें करून ॥ शर मोडोन टाकीत ॥६६॥

तों रिता जाहला तूणीर ॥ जटायूस न लागे एक शर ॥ परम प्रतापी तो अरुणपुत्र ॥ केलें विचित्र ते काळीं ॥६७॥

चंचुघातें परम दारुण ॥ मारिले अश्र्व मोडिला स्यंदन ॥ सारथियाचें शिर छेदोन ॥ न लागतां क्षण पैं नेलें ॥६८॥

मुकुट धनुष्य तूणीर ॥ झडप घालोनि नेलें समग्र ॥ चूर्ण केले वस्त्रालंकार ॥ दशकंधर नग्न उभा ॥६९॥

रावणमस्तकीचे केश ॥ उपडोनि टाकिले निःशेष ॥ क्षपणिक जैसा लंकेश ॥ निःशस्त्री नग्न उभा असे तो ॥७०॥

गगनींहून अकस्मात ॥ रावणावर पडे जैसा पर्वत ॥ चंचुघातें समस्त ॥ मस्तकें दाही फोडिलीं ॥७१॥

रुधिरें जाहला बंबाळ ॥ जैसा कुंकुमें माखिला शैल ॥ सांडिली जानकी वेल्हाळ ॥ घेतला पळ रावणें ॥७२॥

हृदयीं बोध ठसावतां समग्र ॥ निःशेष पळे अहंकार ॥ सीता टाकोनि दशकंधर ॥ पळे तैसा भयेंचि ॥७३॥

मनीं विचारी लंकानाथ ॥ पांखरें मज गांजलें बहुत ॥ मग उभा राहोनि तेथें ॥ पाचारीत जटायूतें ॥७४॥

म्हणे तुज रघुनाथाची आण ॥ सांगें तुझें मृत्युंग कोण ॥ मीहि सांगतों आपुलें मरण ॥ युद्धकंदन मग करूं ॥७५॥

जटायु म्हणे पक्ष उपडितां ॥ मज मृत्यु तेव्हांचि तत्वतां ॥ तुझें मरण लंकानाथा ॥ तैसेंच सांगें त्वरेनें ॥७६॥

येरू म्हणे चरणांगुष्ठ फोडितां ॥ मी मृत्यु पावेन क्षण न लागतां ॥ जटायु यावयासी हाता ॥ राक्षसें केला उपाय ॥७७॥

जटायूनें धांवूनि आंवळिला ॥ दशमुखाचा अंगुष्ठ फोडिला ॥ येरें झेंप घालोनि ते वेळां ॥ दोनी पक्ष उपडिले ॥७८॥

भडभडा चालिलें रुधिर ॥ कासावीस जाहला तो द्विजवर ॥ म्हणे केव्हां येईल रघुवीर ॥ हा समाचार सांगेन तया ॥७९॥

स्कंदतातमित्रांगना ॥ स्कंधीं घेउनि राक्षसराणा ॥ गति थोडी वाटे पावना ॥ निराळमार्गें तेवीं जाय ॥१८०॥

जटायूकारणें अत्यंत ॥ जनकतनयना शोक करित ॥ निजकरें ललाट पिटित ॥ आक्रंदत दीर्घस्वरें ॥८१॥

म्हणे जटायु भक्त पूर्ण ॥ मजकारणें वेंचिला प्राण ॥ मी रामपितृव्य म्हणोन ॥ दशरथासमान मानिला ॥८२॥

ऐसी सीता शोक करित ॥ रावण निराळमार्गे जात ॥ तों मातंग पर्वतावरी अद्भुत ॥ पांच वानर उभे असती ॥८३॥

सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ पांचवा महारुद्र हनुमंत ॥ ज्याचा बळप्रताप उद्भुत ॥ व्यासवाल्मिकीं वर्णिला ॥८४॥

उपजतांचि बाळपणीं ॥ क्षणें आकळिला जेणें तरणी ॥ इंद्रादिक निर्जर समरांगणीं ॥ जर्जर केले प्रतापें ॥८५॥

अंतरिक्षें जातां दशकंधर ॥ जानकी फाडी चीरपदर ॥ अलंकार बांधोनि समग्र ॥ मारुतीकडे टाकिले ॥८६॥

ते ग्रंथि घेऊन हनुमंतें ॥ निराळमार्गें पाहे वरुतें ॥ तों राक्षस जाय गगनपंथे ॥ जानकीतें घेवोनि ॥८७॥

हांक फोडीत सुंदरा ॥ धांव रामा राजीवनेत्रा ॥ घनश्यामा कोमळगात्रा ॥ वंद्य त्रिनेत्रा विधीतें ॥८८॥

हे राम जगदंकुरकंदा ॥ हे ताटिकांतका ब्रह्मानंदा ॥ हे राक्षसांतका जगद्वंद्या ॥ पाव एकदां मजलागीं ॥८९॥

ऐसें ऐकतां हनुमंत ॥ मनीं आवेशला अत्यंत ॥ म्हणे कोणा सभाग्याची वस्त ॥ राक्षस नेतो चोरूनि ॥१९०॥

मारोनिया रजनीचर ॥ सोडवूं आतां हे सुंदर ॥ तिचा शोधीत येईल भ्रातार ॥ देऊं तयासी साक्षेपें ॥९१॥

जैसा देखतां वारण ॥ अकस्मात पडे पंचानन ॥ भयभीत जाहला रावण ॥ म्हणे हें विघ्न दूसरें ॥९२॥

मारुतीचें उड्डाण अद्भुत ॥ गेला ध्रुवमंडळापर्यंत ॥ तों रावण प्रवेशला लंकेत ॥ अदृश्य होत क्षणमात्रें ॥९३॥

काळाचे दाढेंत पडतां उरला ॥ सर्पमुखींचा मूषक पळाला ॥ मृगेंद्रकवेंतून वांचला ॥ पूर्वभाग्यें जंबुक ॥९४॥

व्यर्थ गेले कपीचें उड्डाण ॥ मनीं म्हणे अंजनीनंदन ॥ पुढें याचा सूड घेईन ॥ बहुत गांजीन राक्षसां ॥९५॥

मग अवनिजेचे अलंकार ॥ अवनिगर्भीं ठेवीत वानर ॥ इकडे लंकेंत दशकंधर ॥ काय करिता जाहला ॥९६॥

परम सबळ अठरा राक्षस ॥ त्यांसी अज्ञापी लंकेश ॥ म्हणे जाऊनि पंचवटीस ॥ शोधा रामासी साक्षेपें ॥९७॥

राघवा आणि लक्ष्मणा ॥ वधोनि यावें दोघांजणां ॥ त्यांहीं मस्तकीं वंदोनि आज्ञा ॥ उत्तरपंथें चालिले ॥९८॥

कीं काळें बोलावूं पाठविले ॥ आयुष्यसिंधूचें जळ आटलें ॥ कीं मृत्युपरीस चालिले ॥ स्थळ पहावया रावणा ॥९९॥

रावण सीतेसी एकांतीं नेऊन मग बहुत प्रार्थीं ॥ पायीं लागे लंकापती ॥ काकुळती येतसे ॥२००

वैभवसंपत्ति दावी समस्त ॥ वर्णीं आपुला पुरुषार्थ ॥ म्यां बंदीं घातले देव समस्त ॥ मज त्वरित वरीं कां ॥१॥

लाज न धरी कामातुर ॥ मरण नेणे प्रतापशूर ॥ मद्यपियास सारासार ॥ कांहीं विचार समजेना ॥२॥

कामुकांसी नव्हेचि विरक्ति ॥ मैंदासी काय हरिभक्ति ॥ व्याघ्रासी उपजेल शंाति ॥ काळत्रयीं घडेना ॥३॥

असो लाज सोडोनि दशवदन ॥ म्हणे जानकी ऐक वचन ॥ एकराशी रामरावण ॥ लावीं लग्न ऐक्यत्वें ॥४॥

चित्रा नक्षत्र तूळराशी ॥ समान रामरावणांसी ॥ तरी तूं अवज्ञा कां करिशी ॥ बोल वेगें शुभानने ॥५॥

जानकी म्हणे दशमुखा ॥ तस्करा महामलिना मूर्खा ॥ पतंग आलिंगितां दीपिका ॥ कैसा मग वांचेल ॥६॥

प्रळयाग्नींत स्नान करूनि ॥ मशक केवीं येईल परतोनि ॥ वासुकीचा विषदंत पाडूनि ॥ मूषक कैसा आणील ॥७॥

मृगेंद्रजिव्हेचें मांस देख ॥ तोडूनि केवीं वांचेल जंबुक ॥ आदित्यमंडळ मंडूक ॥ पाडील कैसें भूमितें ॥८॥

सौंदणी आणि समुद्र ॥ दोनी एकराशी साचार ॥ वायस आणि वैनतेय पक्षींद्र ॥ एकराशी होतसे ॥९॥

सिंह आणि श़ृगाल जाण ॥ मशक महेश राशी समान ॥ तम आणि तरणि पूर्ण ॥ केवीं समान सांगपां ॥२१०॥

रजक आणि रमावर ॥ कुक्कुट आणि कुंजर ॥ रजनीचर आणि रघुवीर ॥ केंवीं समान सांगपां ॥११॥

कंटक आणि कंजलोचन ॥ कपटी आणि कमळासन ॥ तैसा राम आणि रावण ॥ राशी गुण कासया ॥१२॥

मदनें सर्वांसी जिंकिलें ॥ परी शिवापुढें तें न चाले ॥ अग्नीनें सर्वांसी जाळिलें ॥ परी मेघापुढें काय तो ॥१३॥

सर्वांसी गांजिसी तूं परम ॥ परी मज स्पर्शतां होशी भस्म ॥ आतां तुज वधावया रघुत्तम ॥ पूर्णकाम येईल ॥१४॥

मनीं भावी रावण ॥ हिचें जों स्थिरावे मन ॥ तोंवरी अशोकवनीं नेऊन ॥ ठवूं इतें रक्षोनियां ॥१५॥

मग त्रिजटेचेनि अनुमतें ॥ अशोकवनीं ठेवी जानकीतें ॥ भोंवतीं दृढ रक्षणें बहुतें ॥ ठायींठायीं ठेविलीं ॥१६॥

अशोकवनाबाहेर ॥ पांचकोटी रजनीचर ॥ सावध बैसले अहोरात्र ॥ नव्हे संचार वायूचा ॥१७॥

निधानाभोंवत्या भूतावळी ॥ रक्षिती जैशी सर्वकाळीं ॥ तैशा राक्षसी सीतेजवळी ॥ वेष्टोनियां बैसल्या ॥१८॥

सत्वशीळ बिभीषण ॥साधु पुण्यपरायण ॥ म्हणे सीता आणून संपूर्ण ॥ कुळक्षय मांडिला ॥१९॥

रावण परम कामातुर ॥ जाहला उन्मत्त अविचार ॥ तप्त जाहले शरीर ॥ नावडे उपचार विलास ॥२२०॥

ब्रह्मयासी म्हणे रावण ॥ पुरे तुझें वेदाध्ययन ॥ अंगिरापती तुझें ज्ञान ॥ ठेवीं झांकोन क्षणभरी ॥२१॥

किन्नर हो पुरे गायन ॥ नका चेतवूं पंचबाण ॥ सीतेच्या भोगालागीं प्राण ॥ कासावीस होताती ॥२२॥

सकळ गंगा घरीं राबत ॥ तयांसी म्हणे लंकानाथ ॥ शीतळ उपचार बहुत ॥ करा आतां मजलागीं ॥२३॥

बोलावूनि राक्षसिणी ॥ रावण सांगे त्यांचे कर्णीं ॥ सीतेसी तुम्ही भेडसावुनी ॥ मम शयनीं वश करा ॥२४॥

अवश्य म्हणती निशाचरी ॥ अमंगळा धांविन्नल्या एकसरी ॥ म्हणती सीते तूं रावणासी वरीं ॥ नाहीं तरी तुज भक्षूं ॥२५॥

विकटरूप विशाळकर्ण ॥ एक वक्रमुख लंबस्तन ॥ बाबरझोटी आरक्तनयन ॥ भेडसाविती सीतेतें ॥२६॥

खरमुख व्याघ्रवदन ॥ सूकरगजमुख लंबचरण ॥ ज्यांच्या नासिकांमाजी जाण ॥ खर तुरंग गुंतले ॥२७॥

एकी स्तनचपेटें करूनि ॥ झाडें टाकिती मोडूनि ॥ एकपदा द्विपदा त्रिचरणी ॥ खाऊं म्हणती सीतेतें ॥२८॥

परम कुरूप कुत्सित वर्ण ॥ अमंगळ दुर्गंधि विटे मन ॥ एक म्हणे इचे नरडीं बैसोन ॥ घोट घेऊं आतांचि ॥२९॥

एक म्हणती काढा शिरा ॥ दांत खाती करकरां ॥ डोळे वटारिती पुढारां ॥ हांक देती आक्रोशें ॥२३०॥

ऐसें करिती राक्षसिणी ॥ परी ते त्रिभुवनपतीची राणी ॥ निर्भय परम अंतःकरणीं ॥ कदा न गणी तयांसी ॥३१॥

संसारदुःखें नाना गती ॥ ज्ञानियांचे आंगी आदळती ॥ परी ते सहसा न गणिती ॥ सीता सती तैशीच ॥३२॥

बहुत भुंकती श्र्वान ॥ परी कदा न भी वारण ॥ कीं जंबूक हाकें पंचानन ॥ कदा दचकोनि उठेना ॥३३॥

कीं सुटतां झंझामारुत ॥ धुळीनें तृण बहुत उडत ॥ परी बैसका न सोडी पर्वत ॥ निर्भय सत्य सीता तैसी ॥३४॥

जैसी कागांमाजीं कोकिळा ॥ तैसी त्रिजटा पुण्यशीळा ॥ राक्षसी दटावून सकळा ॥ दूर केल्या साक्षेपें ॥३५॥

त्रिजटा म्हणे जनकनंदिनी ॥ तूं चिंता न करीं मनीं ॥ तुज भेटेल कोदंडपाणी ॥ अल्पकाळेंकरूनियां ॥३६॥

वर्तमान अयोध्येपासोनि ॥ जें जें वर्तलें जनस्थानीं ॥ त्रिजटेप्रति जनकनंदिनी ॥ सांगे सकळ प्रीतीनें ॥३७॥

सिंहावलोकनेंकरून ॥ परिसा मागील चरित्र पूर्ण ॥ मृग वधोनि रामलक्ष्मण ॥ आश्रमासीं पातले ॥३८॥

ते कथा गोड अत्यंत ॥ श्रवण करोत ज्ञाते पंडित ॥ रसिक रामविजय ग्रंथ ॥ श्रवणें समस्त कोड पुरे ॥३९॥

अयोध्याधीशा ब्रह्मानंदा ॥ श्रीधरवरदा आनंदकंदा ॥ अभंग अक्षय अभेदा ॥ वेदवंद्या सुखाब्धी ॥२४०॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधारा ॥ सदा पसिसोत भक्त चतुर ॥ पंचदशोध्याय गोड हा ॥२४१॥

अध्याय ॥१५॥ ओंव्या ॥२४१॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

श्रीरामविजयअध्याय १६ वा

श्रीगणेशाय नमः

श्रीरामकथा अति सुरस ॥ सकळ तीर्थांहूनि विशेष ॥ गंगेपरीस निर्दोष ॥ निजभक्तांसी प्रिय होय ॥१॥

इहपरत्रतीर साचार ॥ रघुवीरचरित्र निर्मळवीर ॥ दाटला पूर्ण प्रेमपूर ॥ गर्जे थोर रामघोषें ॥२॥

गंगेमाजी वाहे जीवन ॥ कथासरिता ते जगज्जीवन ॥ चित्तवृत्तिजळचरें पूर्ण ॥ माजि निमग्न तळपती ॥३॥

तेथें घडिघडी डहुळे पाणी ॥ रामकथा निर्मळ अनुदिनीं ॥ ब्रह्मानंदें उचंबळोनी ॥ पुनीत करी त्रिभुवना ॥४॥

गंगेमाजी बुडतां मरावें ॥ येथें बुडी देतां तरावें ॥ हें विशेष कर्तृत्व स्वभावें ॥ गंगेहूनि अधिक ॥५॥

रामकथा करितां श्रवण ॥ सकळही तीर्थीं केलें स्नान ॥ तें फळ आलें हाता पूर्ण ॥ विशेष जाण रामकथा ॥६॥

ऐसी रघुवीरकथा पावन ॥ परी संत श्रोते सावधान ॥ तरी वक्त्याचा हर्ष पूर्ण ॥ गगनामाजी न समाये ॥७॥

पंधरावे अध्यायीं कथा सुंदर ॥ सीतेसी घेऊन गेला दशवक्र ॥ मृग वधोनि राम-सौमित्र ॥ पंचवटीये परतले ॥८॥

मार्गीं होती अपशकुन ॥ चालतां जड जाहले चरण ॥ आश्रमांत पाहती येऊन ॥ दिसे शून्य भणभणित ॥९॥

जैसें प्राणाविण कलेवर ॥ कीं उदकेंविण सरोवर ॥ कीं नासिकाविण वक्र ॥ शोभिवंत दिसेना ॥१०॥

फळेंविण तरुवर ॥ कीं सैन्येंविण नृपवर ॥ कीं वंशीं नसतां कन्याकुमर ॥ व्यर्थ मंदिर ज्यापरी ॥११॥

कीं दयेवांचूनि ज्ञान ॥ कीं प्रेमेंविण कीर्तन ॥ कीं बुबुळेंविण नयन ॥ गुंफा शून्य तेवीं दिसे ॥१२॥

ऋषींप्रति पुसावें वर्तमान ॥ तंव ते पळाले कुटुंबें घेऊन ॥ दशदिशा दिसती शून्य ॥ रघुनंदन गहिंवरला ॥१३॥

नेत्रीं चालिल्या अश्रुधारा ॥ सीता सांग कोठें सौमित्रा ॥ ऐसें बोलतां नवपंकजनेत्रा ॥ मूर्च्छना आली ते वेळीं ॥१४॥

निचेष्टित पडे रघुनंदन ॥ वारा घाली लक्ष्मण ॥ नेत्रांस लावोनि जीवन ॥ जगज्जीवन सावध केला ॥१५॥

देवाधिदेव आत्माराम ॥ नीलग्रीव जपे ज्याचें नाम ॥ त्यासी कां जाहला मोहभ्रम ॥ नवल परम हें वाटे ॥१६॥

अंधकूपीं बुडाला दिनकर ॥ प्रळयाग्नीस बाधी शीतकर ॥ कल्पवृक्ष दारोदार ॥ मागेल भिक्षा कासया ॥१७॥

काळासी भूतें झडपिती ॥ मृगजळीं बुडाला गभस्ती ॥ म्हणोनि सीतेसाठीं रघुपति ॥ करी खंती नवल हें ॥१८॥

तो पुराणपुरुष रघुनंदन ॥ मायातीत शुद्धचैतन्य ॥ परी मायेचा अभिमान पूर्ण ॥ मायामय लटिकाचि ॥१९॥

दावी वर्तोनि जगद्रुरु ॥ करोनि मायामय पसारु ॥ हें जगीं वोडंबर दावी रधुवीरु ॥ मायामय लटिकेंचि ॥२०॥

असो वसिष्ठें उपदेशिलें ज्ञान ॥ कीं सर्वद्रष्टा एक आपण ॥ हा जगडंबर भास पूर्ण ॥ मायामय लटिकाचि ॥२१॥

जैशा स्वप्नींच्या जन्मपंक्ती ॥ यातना भोगी नानागती ॥ जागा होतां निश्र्चिंतीं ॥ मिथ्यामय सर्वही ॥२२॥

स्वप्नामाजी पतिव्रता ॥ जैसें मरण देखे प्राणनाथा ॥ परी सवेंचि जागी होतां ॥ सौभाग्य पाहतां तैसेंचि ॥२३॥

घट फुटतां चंद्रबिंब ॥ तैसेंचि असे स्वयंभ ॥ तरी अवतारलीला सीतावल्लभ ॥ संपादोनि दावीतसे ॥२४॥

असो सौमित्रास म्हणे रघुनाथ ॥ भोंवतें वृक्ष आणि पर्वत ॥ यांसी पुसों यथार्थ ॥ सीताशुद्धि ते सांगती ॥२५॥

गिरिकंदरीं गिरिमाळ ॥ शोधीत जात तमाळनीळ ॥ गोदातीरीं निर्मळ ॥ शोधी सकळ सौमित्रा ॥२६॥

वनोंवनीं राम धांवत ॥ सीते सीते आळवित ॥ कुरंगनयने भेट त्वरित ॥ शोकें बहुत व्यापिलों ॥२७॥

बदक चातक राजहंस ॥ मयूर रावे साळया सरस ॥ तयांसी पुसे अयोध्याधीश ॥ कोठें डोळस जानकी ॥२८॥

मृग शार्दुळ सिंह उरग ॥ नकुळ सूकर कस्तुरीमृग ॥ कोकिळा चक्रवाकें भृंग ॥ सीतारंग पुसे तयां ॥२९॥

कोणी न देती उत्तर ॥ त्यांवरी कोपला रघुवीर ॥ सौमित्र आणी धनुष्य शर ॥ छेदीन कांतार सर्वही ॥३०॥

सौमित्र म्हणे रघुनंदना ॥ हे केवीं जाणती तुझी अंगणा ॥ यांवरी कोप राजीवनयना ॥ सहसाही न करावा ॥३१॥

सीताविरहें रघुनंदन ॥ भुलोनि बोले काय वचन ॥ लक्ष्मणासी पूसे तूं कोण ॥ काय कारण येथें उभा ॥३२॥

तेव्हां सौमित्र बोले वचन ॥ श्रीरामाचा बंधु मी पूर्ण ॥ मग बोले वेदवंद्य रघुनंदन ॥ राम तो कोण कोठील ॥३३॥

भवकोदंड भंगिलें थोर ॥ तोचि राम समरधीर ॥ मग बोले सीतावर ॥ धनुष्य कोठें भंगिलें ॥३४॥

जनकाचिया मंडपांत ॥ धनुष्य भंगिलें यथार्थ ॥ जनक कोणाचा निश्र्चित ॥ सांग मज आतांचि ॥३५॥

जानकीचा जो पिता ॥ तो जनक जाण रघुनाथा ॥ अहा जानकी गुणसरिता ॥ मज आतांचि दावीं रे ॥३६॥

सौमित्रासी म्हणे रघुवीर ॥ आमचे कोठें ग्राम मंदिर ॥ येरू म्हणे अयोध्यापुर ॥ सेविलें कांतार पितृआज्ञें ॥३७॥

वना आलों कोण कोण ॥ उत्तर देत सुमित्रानंदन ॥ तुम्ही आम्ही सीताचिद्रत्न ॥ तिघेंजण आलों वना ॥३८॥

तरी जानकी दावीं त्वरित ॥ ऐसें बोले रघुनाथ ॥ भूमीवरी पडे मूर्च्छागत ॥ सौमित्र मग सांवरी ॥३९॥

तों अस्ता गेला दिनकर ॥ रात्रींमाजी प्रगटे रोहिणीवर ॥ राम म्हणे रे जाळितो मित्र ॥ अति तीव्र बहुत कां ॥४०॥

मग बोले सुमित्रासुत ॥ स्वामी हा चंद्र नव्हे आदित्य ॥ शीतळ किरण उष्ण वाटत ॥ सीताविरहेंकरूनियां ॥४१॥

श्रीरघुनाथ देवाधिदेव ॥ दावी इत्यादि बहुत भाव ॥ जो अज अजित स्वयमेव ॥ उमाधव ध्यात जया ॥४२॥

सीते सीते म्हणोन ॥ आलिंगीत वृक्ष पाषाण ॥ तों तत्काळ ते उद्धरोन ॥ जाती बैसोनि विमानीं ॥४३॥

सौमित्रासी म्हणे रघुनंदन ॥ चला घेऊं अगस्तीचें दर्शन ॥ त्यासी सांगों वर्तमान ॥ बुद्धि तो पूर्ण सांगेल ॥४४॥

अगस्तीचे आश्रमापति ॥ तत्काळ रामसौमित्र येती ॥ तों द्वारपाळ जाऊं न देती ॥ उभे करिती तयांतें ॥४५॥

कलशोद्भवासी वर्तमान ॥ सेवक सांगती जाऊन ॥ तों सीता घेऊनि गेला रावण ॥ ऋृषीस ज्ञानीं समजलें ॥४६॥

अंतरीं विचारी मुनि ॥ राम राज्य सांडोनि हिंडे वनीं ॥ हारविली जनकनंदिनी ॥ शाकेंकरूनि व्यापिला ॥४७॥

स्त्रीविरहित रघुनंदन ॥ आतां न घ्यावें त्याचें दर्शन ॥ सेवकांहातीं सांगोन ॥ पाठविलें ते काळीं ॥४८॥

आजि दर्शन नाहीं तुम्हांतें ॥ मागुती जावें आलिया पंथें ॥ हांसें आलें रघूत्तमातें ॥ हृदय ऋृषीचें जाणोनि ॥४९॥

परतोनि चालिला रघुवीर ॥ परम क्रोधावला सौमित्र ॥ म्हणे निर्दय कठिण विप्र ॥ जगदुद्धारा परतविला ॥५०॥

ज्योतिर्लिंग जाणोन ॥ लत्ताप्रहारें केलें ताडण ॥ कामधेनु आली आपण ॥ डांगेवरी मारिली ॥५१॥

कल्पतरु दारीं उगवला ॥ तो देखतांचि अभाग्यें उपडिला ॥ परीस जाणोनि गोफणिला ॥ चिंतामणि घातला पायरीस ॥५२॥

अमृतकुंभ दैवें लाधला ॥ तो जाणोनि बळेंच उलंडिला ॥ जगद्वंद्य घरासि आला ॥ माघारा दवडिला समजोनि ॥५३॥

मग बोले रघुनंदन ॥ अगस्ति परम सज्ञान ॥ तो सीतेवीण माझें दर्शन ॥ सहसाहि न घेचि ॥५४॥

मी निर्विकार निर्गुण ॥ सीता सर्वांसी कारण ॥ तिणें मज जागें करून ॥ सगुणत्वासी आणिलें ॥५५॥

तिनें निर्मून पंचभूतें ॥ त्रिगुण आणि तत्त्वें समस्तें ॥ अवतारखेळ कौतुकें बहुतें ॥ दावी जनां तेचि पै। ॥५६॥

मी अरूप अनाम निश्र्चितीं ॥ हें सर्व जाणे अगस्ति ॥ तो ऋषीमाजी केवळ गभस्ती ॥ तपें ज्ञानें तेजस्वी जो ॥५७॥

असो श्रीराम जगजेठी ॥ परतोनि आला पंचवटीं ॥ वृक्ष गुल्मलता कवळी पोटीं ॥ सीता सीता म्हणोनियां ॥५८॥

पंचवटीचा त्याग करून ॥ तत्काळ चालिला रघुनंदन ॥ जैसी अहंदेहबुद्धि सांडोन ॥ योगी विचरे निरंजनीं ॥५९॥

कीं प्राण त्यागिलिया काया जैसी ॥ कीं कोपत्यागें जमदग्नि ऋषि ॥ कीं संसारमाया निश्र्चयेसीं ॥ विरक्त त्यागी मनींहूनि ॥६०॥

जीर्ण देह त्यागोनि उरग ॥ कीं तपोधन करी कामत्याग ॥ कीं पवित्र त्यागी कुमार्ग ॥ श्रेष्ठ कर्म जाणोनियां ॥६१॥

कीं परनिंदा सज्जन टाकिती ॥ आत्मस्तुति सांडिजे संती ॥ कीं अमंगळाची संगती ॥ न धरिती श्रोत्री कदाही ॥६२॥

कीं संसारदुःखें दारुण ॥ विवेकी त्यागी जैसें वमन ॥ तैसी पंचवटी त्यागोन ॥ राम-लक्ष्मण चालिले ॥६३॥

तों मग देखे रघुनंदन ॥ द्वादश हात लांब चरण ॥ चार हात रुंद पूर्ण ॥ राक्षसपाऊलें उमटलीं ॥६४॥

त्यांजवळी कुंकुमांकित जाण ॥ सीतेचे उमटले चरण ॥ मुक्तें विद्रुमें पडलीं गळोन ॥ लक्ष्मण पाहे विस्मित ॥६५॥

कमळिणीमित्रकुळभूषण ॥ शोधीत जात घोर विपिन ॥ तों जटायु देखिला दुरोन ॥ रक्तेंकरून बंबाळ ॥६६॥

किंशुक फुलला बहुत ॥ कीं दुरोन आरक्त दिसत ॥ तैसा जटायु पडला तेथ ॥ रामस्मरण करीतचि ॥६७॥

रघुनाथें भाते घेतले ॥ धनुष्य वेगीं चढविलें ॥ श्रीरामासी ऐसें भासलें ॥ कीं हा राक्षस बैसलासे ॥६८॥

भक्षोनियां जनकनंदिनी ॥ बैसलासे तृप्त होउनी ॥ रक्त वहात चहूंकडोनी ॥ पर्वतीं जैसा पाझर ॥६९॥

जवळी आला चापपाणि ॥ तों रामनामाची मधुर ध्वनी ॥ ती रघुत्तमें ऐकोनि श्रवणीं ॥ येत धांवोनि समीप ॥७०॥

तों डोळा उरलासे प्राण ॥ जटायु पडिला करीत स्मरण ॥ रघुनाथ तो भक्त देखोन ॥ हृदयीं पूर्ण गहिंवरला ॥७१॥

जटायूस पुढें घेऊन देख ॥ शोक करी अयोध्यानायक ॥ जैसें एकुलतें मरतां बाळक ॥ माता तळमळे ज्यापरी ॥७२॥

कीं परम मित्र बंधु रणीं ॥ पडलिया वाटे जेवीं हानी ॥ त्याचपरी चापपाणी ॥ हृदयीं धरोनि विलपत ॥७३॥

परम खेद करी सौमित्र ॥ म्हणे जटायु भक्त आणि मित्र ॥ जो मित्रसारथियाचा पुत्र ॥ ऐसा पवित्र नाढळे ॥७४॥

जटायूस म्हणे रघुवीर ॥ बारे काय जाहला समाचार ॥ तो मज सांग अणुमात्र ॥ जरी शक्ती असेल बोलावया ॥७५॥

श्रीरामाचे कर्णयुगलीं ॥ हळूच जटायु सांग ते वेळीं ॥ रावणें सीता लंकेसी नेली ॥ म्यां सोडविली होती येथें ॥७६॥

भोंवतें पाहे रघुनंदन ॥ तों अश्र्व सारथि आणि स्यंदन ॥ रावणाची वस्त्रें अलंकार पूर्ण ॥ चूर्ण होऊन पडियेलीं ॥७७॥

पाहतां जटायूचा पराक्रम ॥ पुढती गहिंवरे रघूत्तम ॥ सीताशोकाहून परम ॥ शोक वाटे जटायूचा ॥७८॥

जटायु बोले वचन ॥ रघुपती तुझी घालोनि आण ॥ राक्षसें घेतला माझा प्राण ॥ पक्ष उपडोनि टाकिले ॥७९॥

माझ्यानें आतां न बोलवे देख ॥ म्हणोनि पदीं ठेविला मस्तक ॥ श्रीरामाच्या नेत्रोदकें अभिषेक ॥ जाहला जटायूतें ॥८०॥

मग बोले रघुनंदन ॥ जटायु तुज मी उठवीन ॥ मज तूं साह्य होईं पूर्ण ॥ दशरथाऐसा सत्वर ॥८१॥

मग बोले अरुणनंदन ॥ ऐसें मज पुढें न ये मरण ॥ तुझे अंकावरी जाण ॥ सोडीन प्राण आतांचि ॥८२॥

जटायु विलोकी रामवदन ॥ हृदयीं रेखिलें तैसेंचि ध्यान ॥ मुखें करीत नामस्मरण ॥ चालिला प्राण ते काळीं ॥८३॥

श्रीरामें तेव्हां हृदयीं धरिला ॥ तेथेंच जटायूनें प्राण सोडिला ॥ ब्रह्मा हंसविमान घेऊन आला ॥ वरी बैसविला जटायु ॥८४॥

जटायूस म्हणे रघुनंदन ॥ तुज स्वर्गीं भेटले दशरथ जाण ॥ त्यासी सीता नेली हे वर्तमान ॥ सहसाही न सांगावें ॥८५॥

परम प्रतापी दशरथ पिता ॥ कर्मभूमीस येईल मागुता ॥ यालागीं न सांगावी वार्ता ॥ जाण तत्वतां जटायु ॥८६॥

मी रावणास वधोनी ॥ पाठवीन स्वर्गभुवनीं ॥ मग तो स्वमुखेंकरूनि ॥ वृत्तांत सर्व सांगेल ॥८७॥

असो जटायु स्वर्गा पावला ॥ रघुनाथ्ज्ञें तो पितृव्य मानिला ॥ दशरथें बंधु म्हणविला ॥ शक्राचिया युद्धकाळीं ॥८८॥

यालागीं जनकजामातें ॥ पितृव्य मानिला जटायूतें ॥त्याचेनि संगें सीताकांतें ॥ पंचवटिये काळ क्रमियेला ॥८९॥

घडीघडी येवोनि बैसे ॥ श्रीराम त्यासी गोष्ट पुसे ॥ जटायु भक्त विशेषें ॥ रघुपतीचा आवडता ॥९०॥

त्याची उत्तरक्रिया समस्त ॥ करिता जाहला कौसल्यासुत ॥ सौमित्रें काष्टें मेळवून बहुत ॥ अग्नि दीधला तयासी ॥९१॥

ऐसा भक्तकरुणाकर ॥ शरणांगतां वज्रपंजर ॥ पुढें चालिला राघवेंद्र ॥ सीता सुंदर शोधावया ॥९२॥

दक्षिणपंथें दंडकारण्यांत ॥ जेथें राहिला रघुनाथ ॥ शिवलिंग स्थापिलें तेथ ॥ बाणचिन्हांकित अद्यापि ॥९३॥

मयूरगिरी परम गहन ॥ तेथें आला अहल्योद्धारण ॥ हे सीते हे सीते म्हणोन ॥ वृक्षपाषाण आलिंगी ॥९४॥

तों कैलासीं वर्तलें नवल ॥ बैसला असतां जाश्र्वनीळ ॥ हातीं घेऊनि जपमाळ ॥ जपे कोमळ रामनाम ॥९५॥

जेणें शमलें हाळाहळ ॥ तें सहस्रनामांहूनि निर्मळ ॥ चंद्रापरीस अति शीतळ ॥ अमृताहूनि गोड पैं ॥९६॥

जें दिनकरापरिस तेजाळ ॥ जें आकाशापरी विशाळ ॥ जें सकळ आनंदाचें मूळ ॥ नाम केवळ परब्रह्म ॥९७॥

रूप सगुण नाम निर्गुण ॥ रूप मायामय आनंदघन ॥ रूप झांके नाम पूर्ण ॥ अनंतयुगीं ठसावें ॥९८॥

रूप सेवेंचि नाम निर्वच ॥ रूप क्षणिक नाम साच ॥ नामअर्थ करितां उगेच ॥ वेद तटस्थ राहिले ॥९९॥

असो तें नाम सर्वांत सार ॥ अखंड स्मरतां कर्पूरगौर ॥ तेथें हिमाद्रितनया जोडूनि कर ॥ विनवी सादर शिवातें ॥१००॥

म्हणे स्वामी जप आणि ध्यान । कवणाचें करितां रात्रंदिन ॥ कोण थोर असे तुम्हांहून ॥ मजलागोनि सांगा तें ॥१॥

शिव म्हणे ऐक शुभकल्याणी ॥ सकळगुणसरिते लावण्यखाणी ॥ जो रविकुळमुकुटदिव्यमणी ॥ मी ध्यातों मनीं तयातें ॥२॥

जो राक्षसकाननवैश्र्वानर ॥ जो भक्तहृदयारविंदभ्रमर ॥ जो अज्ञानतमनाशक दिनकर ॥ जो उदार श्रीराम ॥३॥

जो त्रैलोक्यनगरस्तंभ विशाळ ॥ जो निगमवल्लीचें पक्व फळ ॥ जो जगदंकुरकंद निर्मळ ॥ तो तमाळनीळ श्रीराम ॥४॥

जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो भवगजविदारक पंचानन ॥ जो जनकजामात मखपाळण ॥ त्याचध्यान करितों मी ॥५॥

ऐकतां हांसिन्नलीं भवानी ॥ तो राम हिंडतो वनीं ॥ सीता सीता म्हणोनी ॥ वृक्ष पाषाण आलिंगतो ॥६॥

रावणें नेली त्याची युवती ॥ स्त्रीवियोगें भ्रंशली मति ॥ त्याचें ध्यान अहोरात्रीं ॥ तुम्ही करितां नवल हें ॥७॥

शिव म्हणे तो रघुवीर ॥ लीलावतारी निर्विकार ॥ वेद आणि भोगींद्र ॥ नेणती पार जयाचा ॥८॥

तो पूर्णब्रह्मानंद निर्गुण ॥ देवांची करावया सोडवण ॥ सगुणलीलावेष पूर्ण ॥ भक्तांलागीं दावितसे ॥९॥

विश्र्वरूप एक रघुवीर ॥ जेवीं सुवर्ण एक बहु अलंकार । कीं बहुत सदनें एक अंबर ॥ सीतावर व्यापक तैसा ॥११०॥

कीं बहुत लहरिया एक सागर ॥ लोह एक शस्त्रें अपार ॥ पट दिसती चित्र विचित्र ॥ तरी तंतु सर्व एकचि ॥११॥

बहु बिंदु एक जलधर ॥ घृत एक कणिका अपार ॥ की अनेक वाद्यांत साचार ॥ एकचि नाद दुमदुमे ॥१२॥

एक उर्वी बहुत वनस्पती ॥ एक वेद बहुत श्रुती ॥ कीं एकाच नभीं झळकती ॥ उडुगणें जैशीं अपार ॥१३॥

तैसा राम व्यापक तत्वतां ॥ मग बोले हिमनगसुता ॥ तुम्ही एवढा महिमा वर्णितां ॥ त्या रघुनाथा भुलवीन मी ॥१४॥

मग जानकीचें रूप धरुनी ॥ रामासन्मुख आली भवानी ॥ कांचनर्णी सुहास्यवदनीं ॥ पद्मनयनी सुरेख ॥१५॥

बोलतां झळकती दंतपंक्ती ॥ तें तेज न लोपे गगनक्षितीं ॥ पदरजें हिरे होती ॥ अतर्क्य गति तियेची ॥१६॥

अंगींचा मकरंद अपार ॥ त्या सुवासें तृप्त कांतार ॥ सुगंधासी वेधोनि समग्र ॥ षट्पदचके्रं धांवती ॥१७॥

विद्युत्प्राय पीतवसन ॥ सर्वांलंकारीं मंडित पूर्ण ॥ राघव तियेतें देखोन ॥ मुख मुरडोन चालिला ॥१८॥

तिकडे न पाहेचि सर्वथा ॥ तंव पुढें ये गजास्यमाता ॥ म्हणे स्वामी रघुनाथा ॥ आल्यें मी सीता पहा मज ॥१९॥

मागुती तियेसी टाकून ॥ राम आलिंगी वृक्ष पाषाण ॥ आश्र्चर्य करी लक्ष्मण ॥ जानकी सुटोन आली कीं ॥१२०॥

मग म्हणे आत्मयारामा ॥ विषकंठहृदया पूर्णब्रह्मा ॥ जानकीलागीं पूर्ण कामा ॥ आलिंगन द्यावें जी ॥२१

व्याघ्राचिये कवेंतुनी ॥ पूर्वभाग्यें वांचे कुरंगिणी ॥ अयोध्यानाथा तुझी राणी ॥ आली सुटोनि तैशीचि ॥२२॥

सुरवर पाहतीं गगनीं ॥ म्हणती जानकी जवळी असोनी ॥ तिकडे न पाहे मोक्षदानी ॥ कोप मनीं धरिला कां ॥२३

सौमित्र म्हणे पद्मलाक्षा ॥ मनमोहना निर्विकल्पवृक्षा ॥ सीतेसी आलिंगीं सर्वसाक्षा ॥ पुरवीं अपेक्षा तियेची ॥२४॥

मग बोले रघुवीर ॥ तुम्हांस नेणवे कापट्यविचार ॥ हे अपर्णादेवी साचार ॥ ठकवाया आली आम्हां ॥२५॥

शिवासी करूनियां पण ॥ ठकवावया आली आपण ॥ तुम्हांस नेणवे हे खूण ॥ अंतज्ञानें कळेचि ॥२६॥

कैलासींच्या खुणा समस्त ॥ सौमित्रासी सांगे रघुनाथ ॥ स्कंदमाता जाहली तटस्थ ॥ म्हणे हा अजित पूर्णब्रह्म ॥२७॥

मग ते मूळपीठनायिका ॥ प्रकट रूप दावी अंबिका ॥ विश्र्वजनकाचिया जनका ॥ वर द्यावया पुढें आली ॥२८॥

श्रीराम म्हणे हो माते ॥ ज्ञानगंगे हिमनगसुते ॥ शिवआज्ञा मोडोनि येथें ॥ किमर्थ केलें आगमन ॥२९॥

ऐसें बोलून कौसल्यासुत ॥ सीते सीते म्हणोनि बाहत ॥ वृक्ष पाषाण ओ देत ॥ पाहे तटस्थ अंबिका ॥१३०॥

दुर्गा म्हणे रघुनंदना ॥ भार्गवजिता शिवमनरंजना ॥ नरवीरश्रेष्ठा आनंदसदना जगद्वंद्या जगदुरु ॥३१॥

तूं निर्विकार ज्ञानघन ॥ तरी कां आलिंगिसी वृक्षपाषाण ॥ श्रीराम म्हणे हें वर्तमान ॥ पूस जावोनि शिवातें ॥३२॥

तुझें अंतरी नाहीं विश्र्वास ॥ नेणसी अध्यात्मज्ञान लेश ॥ मी कां आलिंगितों वृक्षांस ॥ परमपुरुष शिव जाणे ॥३३॥

मग अंबिका बोले वचन ॥ तुम्ही एकरूप दोघेजण ॥ एक एकाची अंतरखूण ॥ परस्परें जाणतसां ॥३४॥

आकाशाचें थोरपण ॥ एकचि जाणे प्रभंजन ॥ कीं समीराचें सर्वत्र गमन ॥ अंबर पूर्ण जाणतसे ॥३५॥

सर्व सोडून अभिमान ॥ विरंचिजनका तुज मी शरण ॥ कां आलिंगितां वृक्षपाषाण ॥ सांगा खूण एवढी ॥३६॥

मग अपणेंचे हृदयीं पूर्ण ॥ रामें प्रगटविलें दिव्यज्ञान ॥ म्हणे आतां वृक्षपाषाण ॥ पाहें निरखोनि कोण हे ॥३७॥

सावध पाहे भवानी ॥ तों ते महाऋषि बैसले ध्यानीं ॥ श्रीराम त्यांसी आलिंगोनी ॥ कैवल्यपदा पाववी ॥३८॥

सीतेचें करूनि मिस ॥ रामें उद्धरिले तापस ॥ मग म्हणे हा पुराणपुरुष ॥ लीलावेष दावितसे ॥३९॥

असो अंबिकेचें पूजन ॥ स्वयें करी रविकुलभूषण ॥ मग देवीनें वरदान ॥ रघुवीरास दीधलें ॥१४०॥

म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ तूं सत्वर वधिशील दशानना ॥ जानकी घेऊनि निजसदना ॥ अयोध्येपाशीं येशील ॥४१॥

अहो तेचि हे रामवरदायिनी ॥ अंबा तुळजापुरवासिनी ॥ रघुनाथ पुढें चालिला तेथुनी ॥ दक्षिणपंथें शोधित ॥४२॥

तों पुढें देखिली कृष्णावेणी ॥ दोष नुरे तिच्या स्मरणीं ॥ तिचे तटीं कोदंडपाणी ॥ क्षण एक बैसला ॥४३॥

स्नान करावया रघुनंदन ॥ कृष्णेंत प्रवेशला जगन्मोहन ॥ देखोन सखोल जीवन ॥ जगज्जीवन बुडी देत ॥४४॥

विष्णुतनु कृष्णा साचार ॥ देखोनियां राजीवनेत्र ॥ क्षणें उदकमय जाहलें शरीर ॥ कडे सौमित्र पाहतसे ॥४५॥

तनु जाहली उदकमय ॥ तंव सौमित्र तेथें घाबरा होय ॥ घटका एक वाट पाहे ॥ म्हणे काय करूं आतां ॥४६॥

काय जाहली मूर्ति सांवळी ॥ कोठें गेली अनाथाची माउली ॥ श्रीरामा तूं जगाची साउली ॥ माझी केली कां उपेक्षा ॥४७॥

सौमित्रें अंग घातलें धरणीं ॥ म्हणे रामा धांव ये क्षणीं ॥ तूं माझी जनकजननी ॥ वनीं मज सांडिलें कीं ॥४८॥

राघवा मग उबगलासी ॥ सांडिलें मज घोरवनासी ॥ मी आतां त्यागीन प्राणासी ॥ निश्र्चयेसी राघवेंद्रा ॥४९॥

जानकीमाता उबगली ॥ तीही मज टाकोन गेली ॥ रघुपति तुझी आशा धरिली ॥ तुवां कली उपेक्षा ॥१५०॥

मग उठोनि सुमित्रासुत ॥ चहुंकडे पाहे तटस्थ ॥ धनुष्य करीं घेत ॥ क्रोध अद्भुत नावरे ॥५१॥

म्हणे कृष्णे तुज उगमापासूनि ॥ निर्जळ करीन ये क्षणीं ॥ बाण काढिला विचारूनि ॥ मुखीं प्रळयाग्नि जयाचे ॥५२॥

आणोनि दे माझा रघुवीर ॥ नवमेघरंग राजीवनेत्र ॥ हें जाणोनि अहल्योद्धार ॥ निघे बाहेर ते काळीं ॥५३॥

सौमित्र चरणीं लागला ॥ ते स्थळीं शंकर स्थापिला ॥ बाहोक्षेत्र म्हणती तयाला ॥ पुढें चालिला रामचंद्र ॥५४॥

आठ राक्षस रावणें पाठविले ॥ रामासी वधूनियां सत्वर वहिले ॥ कबंधाचे कवें सांपडले ॥ तेही गिळिले क्षणार्धें ॥५५॥

त्या कबंधाचे कवेआंत ॥ सांपडले सौमित्र-रघुनाथ ॥ सांचळ ऐकतां कबंध ॥ पसरोनियां आवरिले ॥५६॥

द्वादश योजनें दोनी हस्त ॥ जैसे आड पडिले पर्वत ॥ शिर उतरलें हृदयांत ॥ वज्रघातें करूनियां ॥५७॥

नाहीं तयासी चरण ॥ बैसला दोन्ही हस्त पसरून ॥ त्याचे कवेंत राम लक्ष्मण ॥ अकस्मात सांपडले ॥५८॥

बळ जाणोनि अद्भुत ॥ धनुष्य सज्जोनि अयोध्यानाथ ॥ तीक्ष्ण शरें दोनी हात ॥ छेदोनियां पाडिले ॥५९॥

श्रीराम बाणे उद्धरला ॥ कबंध दिव्य देह पावला रघुपतीच्या चरणीं लागला ॥ उभा राहिला हस्त जोडोनि ॥१६०॥

मी दनूचे उदरीं कश्यपसुत । मद्यपानी महाउन्मत्त ॥ स्थूलशिरा ऋषि तप करित ॥ सेविलें एकांत कानन ॥६१॥

त्यासी म्यां हाक फोडून ॥ भेडसाविला तपोधन ॥ तेणें शापशस्त्रेंकरून ॥ मज ताडिलें ते काळीं ॥६२॥

म्हणे तूं चांडाळ पापखाणी ॥ कबंध होऊन पडे वनीं ॥ मग मी लागलो त्याचे चरणीं ॥ उःशापवाणी बोलिला ॥६३॥

दशरथसुत दंडकारण्यांत ॥ दशमुख वधावया जातां सत्य ॥ दशा तुझी उजळेल यथार्थ ॥ दनुपुत्रा जाणपां ॥६४॥

इंद्रपद घ्यावयासी जाण ॥ मी जपत होतों बहुत दिन ॥ वज्रधरें वज्र उचलोन ॥ मस्तकीं माझे ताडिलें ॥६५॥

मस्तक उदरांत उतरलें ॥ दोनी चरण छेदिले ॥ पूर्वकर्म फळासी आलें ॥ कष्ट भोगिले बहुवस ॥६६॥

जाहला माझा उद्धार ॥ रामा पडिलें माझें शरीर ॥ यासी देवोनि वैश्र्वानर ॥ भस्म करीं आतांचि ॥६७॥

काष्ठें मेळवून सौमित्रें ॥ अग्नींत घातले कलेवर ॥ मग तो पावोनि पुण्यशरीर ॥ विमानांत बैसला ॥६८॥

परीस झगटतां जाण ॥ होय लोहाचें सुवर्ण ॥ तैसा कबंध उद्धरोन ॥ वैकुंठधामा चालिला ॥६९॥

शंखचक्रादि चिन्हांकित ॥ चतुर्भुज विष्णुभक्त ॥ कबंध उद्धारोनि यथार्थ ॥ तोही जाहला तैसाचि ॥१७०॥

मग विमानीं बैसोनि जातां ॥ म्हणे अयोध्याप्रभु रघुनाथा ॥ सुग्रीवासी मैत्री तत्वतां ॥ करीं तूं आतां येथोनि ॥७१॥

जगद्वंद्या जनकजामाता ॥ जलदगात्रा जन्मरहिता ॥ जलजनेत्रा जलजासनताता ॥ जनार्दना जगदगुरो ॥७२॥

असो नमस्कारोनि रघूत्तमा ॥ कबंध पावला निजधामा ॥ पुढें शबरीचिया आश्रमा ॥ जगदात्मा येता जाहला ॥७३॥

परम तपस्वी शबरी ॥ तप करितां जाहली म्हातारी ॥ तिच्या आश्रमीं रावणारी ॥ राहता जाहला दिनत्रय ॥७४॥

तिणें फळें मुळें आणून ॥ भावें अर्चिला रघुनंदन ॥ म्हणे तप जाहलें पूर्ण ॥ राजीवनयन देखिला ॥७५॥

शबरीसी उपदेशिलें ज्ञान ॥ ती तात्काळ गेली उद्धरोन ॥ शरीर सांडोनि कैवल्यसदन ॥ पावली पूर्ण तत्काळीं ॥७६॥

सौमित्र म्हणे पुराणपुरुषा ॥ जगदोद्धारा अयोध्याधीशा ॥ मज निजज्ञान सर्वेशा ॥ कृपा करून उपदेशीं ॥७७॥

मग रामगीता जें आत्मज्ञान ॥ सारासार विचारनिरूपण ॥ लक्ष्मणाप्रति सांगोन ॥ निःसंशय तो केला ॥७८॥

मायिक जगदाभास पूर्ण ॥ सत्य शाश्र्वतरूप निर्वाण ॥ ते चिन्मयवस्तु आपण ॥ निजज्ञान या नामें ॥७९॥

असो यावरी रघुपति ॥ आला हंपीविरूपाक्षाप्रति ॥ पुढें पंपासरोवर निश्र्चितीं ॥ विश्रांतिस्थान शिवाचें ॥१८०॥

दिव्य वल्ली दिव्यद्रुम ॥ सदा सफळ भेदीत व्योम ॥ तेथें स्फटिकागुहा उत्तम ॥ परम आरामस्थळ जें कां ॥८१॥

स्फटिकशिळेवरी श्रीराम ॥ बैसला तेव्हां घनश्याम ॥ जेवीं कैलासी द्यावया क्षेम ॥ बलाहक उतरला ॥८२॥

सौमित्राचे मांडीवरी ॥ शिर ठेवून रावणारी ॥ श्रमोनियां निद्रा करी ॥ निर्विकारी अजित जो ॥८३॥

शेषशायी नारायण ॥ तोचि राम इंदिरारमण ॥ सौमित्राचे अंकीं शिर ठेवून ॥ त्याचपरी शोभला ॥८४॥

असो ते समयीं रघुनाथा ॥ चित्तीं आठवे जनकदुहिता ॥ श्र्वासोच्छास जगत्पिता ॥ घालोन बोले ते समयीं ॥८५॥

अहो जानकी मृगांकवदने ॥ गुणसरिते पद्मनयने ॥ सकळ लावण्यगुणनिधाने ॥ कधीं भेटसी मज आतां ॥८६॥

रामासी जाहला विरहज्वर ॥ तंव कोकिळा बाहती सुस्वर ॥ तयांसी म्हणे त्रिभुवनेश्र्वर ॥ खुंटो स्वर सदा तुमचा ॥८७॥

ते वेळीं तमालनीळा ॥ शरण आल्या सर्व कोकिळा ॥ राम म्हणे वसंतकाळा ॥ माजी शब्द फुटेल ॥८८॥

मृगमृगींस म्हणे रघुनाथ ॥ तुम्हां संघटतां पारधि वधील सत्य । तंव तीं जाहलीं शरणागत ॥ उःशाप देत तयांसी ॥८९॥

तो तुम्हांस रात्रीस वधील सत्य ॥ वरकड दिवस तुम्हांस मुक्त ॥ तंव देखिलीं गजगजी रमत ॥ काय बोलत तयांसी ॥१९०॥

दोघांसी योग होतां यथार्थ ॥ गज पडेल मूर्च्छागत ॥ सात दिवसपर्यंत ॥ अचेतन प्रेतापरी ॥९१॥

तंव तीं आलीं शरण ॥ उःशाप बोले राजीवनयन ॥ जळांत करितां मैथुन ॥ मूर्च्छा नये सहसाही ॥९२॥

मयूरासी म्हणे रघुनायक ॥ तुम्ही व्हारें नपुंसक ॥ तंव तीं शरण येती देख ॥ काय बोले जगद्रुरु ॥९३॥

नयनीं जे अश्रु स्रवती ॥ तेणेंचि वाढेल तुमची संतती ॥ चक्रवाकांस म्हणे रघुपति ॥ सूर्योदयीं भेट तुम्हां ॥९४॥

रात्रीं होय तुम्हांस वियोग ॥ तों दृष्टीं देख कागिणीकाग ॥ त्यांसी म्हणे जन्मांत संग ॥ एकदांच संसारीं ॥९५॥

मी सीतेवीणी भ्रमतों देख ॥ तुम्ही भोगितां रतिसुख ॥ यालागीं दंड हाचि निःशंक ॥ तुम्हांसी केला निर्धारें ॥९६॥

सीतावियोगें रघुनाथ ॥ म्हणे राक्षस येऊन बहुत ॥ यांच्या स्त्रिया हरोनि समस्त ॥ नेईनात सीतेऐशा ॥९७॥

रतिचेष्टा मजसमोर ॥ कांहो करिती वारंवार ॥ माझी जानकी सुकुमार ॥ मज भेटली नाहीं जो ॥९८॥

इत्यादि भाव ते समयीं ॥ दावी जनकाचा जांवई ॥ इचे गुणांस गणना नाहीं ॥ कोटि वर्षें शोधितां ॥९९॥

असो ऋष्यमूकपर्वतारूनि ॥ वानर विलोकिती चापपाणी ॥ नळ नीळ जांबुवंत तरणि ॥ कुमार पाह सुग्रीव ॥२००॥

आणि पांचवा तो हनुमंत ॥ जो अवतरला उमाकांत ॥ त्याचें जन्मकर्म अद्भुत ॥ तृतीयाध्यायीं वर्णिलें ॥१॥

रामविजय ग्रंथराशी ॥ हेचि केवळ वाराणसी ॥ रामकथा विश्र्वेश्र्वरासी ॥ प्रिय म्हणून राहिला ॥२॥

कष्ट न होतां अपार ॥ यात्रेसी धांवती मुमुक्षु नर ॥ श्रवणीं बैसती सादर ॥ संसारकार्य टाकूनि ॥३॥

येथूनि अरण्यकांड संपलें ॥ पुढें किष्किंधाकांड आरंभिलें ॥ जैसे रत्नाहून रत्न आगळें ॥ वैरागरीं निपजे पैं ॥४॥

याचे परीक्षक संतजन ॥ जे ब्रह्मानंदें परिपूर्ण ॥ श्रीधर तयांसी अनन्य शरण ॥ अभंग अक्षय सर्वदा ॥५॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ षोडशाध्याय गोड हा ॥२०६॥

॥श्रीरामचंद्रापर्णमस्तु॥

श्रीरामविजयअध्याय १७ वा

श्रीगणेशाय नमः

संत आणि इतर जन ॥ दिसती समसमान ॥ परी संत आनंदघन ॥ ब्रह्मानंदें डुल्लती ॥१॥

बकासंगे असतां मंराळ ॥ दिसती सारिखे शुद्ध धवळ ॥ परी क्षीर आणि जळ ॥ करिती वेगळें हंसचि ॥२॥

वायसांत वसे कोकिळ ॥ त्यांच्या सारखी दिसे केवळ ॥ परी प्रवर्ततां वसंतकाळ ॥ पंचमस्वरें आवळी ती ॥३॥

जंबुकवनांत वाढला केसरी ॥ परी त्याची कैसी पावेल सरी ॥ क्षणमात्रें गज विदारी ॥ हांकें भरी निराळ ॥४॥स्फटिकांत मुक्ताफळ जाण ॥ दिसे सारिखें समसमान ॥ मुक्त जोहरी काढिती निवडोन ॥ करिती जतन जीवेंसीं ॥५॥

पाषाणांत परिस असे पूर्ण ॥ दिसे तैसाचि जड कठिण ॥ परी तो करी लोहाचें सुवर्ण ॥ कृष्णवर्णा लपवोनि ॥६॥

कस्तुरी आणि मृत्तिका ॥ दिसे रंग एकसारिखा ॥ परी मृगमद सुवासें सकळिकां ॥ श्रीमंतांसी नीववी पैं ॥७॥

तक्र दुग्ध एकवर्ण ॥ परी दुग्ध गोड सकळांसी मान्य ॥ तैसीं संतांचीं रूपें जाण ॥ इतरांसमान न म्हणावीं ॥८॥

ऐसें संत आनंदघन ॥ रामविजय परम पावन ॥ करावया बैसले श्रवण ॥ अतिआदरें करोनियां ॥९॥

आतां किष्किंधाकांडकमळावरी ॥ क्रीडेल वाग्देवी भ्रमरी ॥ तरी तो सुरस अंतरीं ॥ सदा चतुरीं सांठविजे ॥१०॥

षोडशाध्यायीं कथा परिकर ॥ पंपासरोवरासी रघुवीर ॥ आला सजलजलदगात्र ॥ ध्याय त्रिनेत्र जयातें ॥११॥

तों ऋष्यमूक पर्वतावरी ॥ उभे पांच वानर ते अवसरीं ॥ किंवा ते पांच केसरी स्वलीला उभे ठाकले ॥१२॥

कीं कनकाद्रीचीं रत्नें मांडित ॥ पंचश़ृंगें विराजित ॥ कीं उगवले पंच आदित्य ॥ उदयाचळीं एकदां ॥१३॥

कीं साह्य व्हावया रघूत्तमातें ॥ अवतरलीं पंचमहाभूतें ॥ कीं तें पंचायतन शोभतें ॥ ऋष्यमूक पर्वतावरी ॥१४॥

ते पंपासरोवराचे तीरीं ॥ श्रीराम स्फटिकशिळेवरी ॥ सौमित्राचे मांडीवरी ॥ शिर ठेवून पहुडला ॥१५॥

देखतां सौमित्र राघव ॥ भयभीत जाहला सुग्रीव ॥ म्हणे वालीनें हे दोघें मानव ॥ वीर येथें पाठविले ॥१६॥

माझा घात करावया ॥ शत्रूनें दिधले पाठवूनियां ॥ म्हणोनि सुग्रीव तेथोनियां ॥ जाता जाहला सत्वर ॥१७॥

चौघांस न पुसतां तेथून ॥ पळे वेगें मित्रनंदन ॥ वनोपवनें लंघोन ॥ समीरवेगें चालिला ॥१८॥

मग सवेग धांवोनि हनुमंत ॥ उभा केला सूर्यसुत ॥ म्हणे तूं कां भितोसि येथ ॥ काय विपरीत देखिलें ॥१९॥

सुग्रीव म्हणे दोघे धनुर्धर ॥ दिसती परम प्रचंड वीर ॥ त्यांसी विलोकितां भय अपार ॥ माझे हृदयीं संचरलें ॥२०॥

आजि म्यां स्वप्न दिखिलें ॥ दोघे धनुर्धर साह्य जाहले ॥ वालीस वधोनि राज्य दिधलें ॥ किष्किंधचें मजलागीं ॥२१॥

अरुणोदयीं देखिलें स्वप्न ॥ सवें पातले दोघेजण ॥ परी मज धीर न धरवे जाण ॥ भयेंकरून व्यापिलों ॥२२॥

यावरी बोले वायुनंदन ॥ आम्ही असतां चौघे प्रधान ॥ कृतांतासी शिक्षा लावून ॥ तुजला रक्षूं सर्वदा ॥२३॥

तरी हे पंपातीरी दोघेजण ॥ बैसले वीर दैदीप्यमान ॥ कीं बृहस्पति आणि सहस्रनयन ॥ तैसे दोघे दिसती ॥२४॥

कीं एक तपस्वी एक उदास ॥ एक औदार्य एक धैर्य विशेष ॥ कीं एक पुण्य एक यश ॥ तैसे दोघे दीसती ॥२५॥

कीं एक ज्ञान एक विज्ञान ॥ एक आनंद एक समाधान ॥ कीं एक सगुण एक निर्गुण ॥ दोनी स्वरूपें हरीचीं ॥२६॥

एक साधक एक सिद्ध ॥ एक वैराग्य एक बोध ॥ एक मोक्ष एक ब्रह्मानंद ॥ तैसे दोघे दीसती ॥२७॥

यांचिया आगमनें पाहीं ॥ आनंद दाटला माझे हृदयीं ॥ यांचा समाचार लवलाहीं ॥ जाऊन आतां आणितों ॥२८॥

त्यांचिया बोलावरून ॥ कळेल त्यांचें अंतःकरण ॥ स्वाद घेतां रस पूर्ण ॥ चतुर जैसा ओळखे ॥२९॥

अरुणोदयावरून ॥ रजनी सरली कळे ज्ञान ॥ कीं दाहकत्व निरसतां अग्न ॥ शांत जाहला जाणिजे ॥३०॥

कीं संकटसमयावरून ॥ जाणिजे बंधु मित्रजन ॥ कीं इंद्रियनियमनें पूर्ण ॥ योगाचरण जाणिजे ॥३१॥

कीं दयेवरून कळे शांति ॥ कीं तर्कावरून कळे धृती ॥ कीं वेदांत श्रवणें निवृत्ती ॥ दशा बाणली जाणिजे ॥३२॥

कीं प्रेमरसावरून भक्ति ॥ कीं निरपेक्षेवरून विरक्ति ॥ कीं पावला अद्वय मुक्ति ॥ इहपरत्रीं जाणिजे ॥३३॥

तैसें त्यांचें अंतर समस्त ॥ मी आणितों तूं राहें स्वस्थ ॥ जरी तेथें असेल विपरीत ॥ हस्तसंकेत दावीन तूतें ॥३४॥

ऐसें बोलोनि हनुमंत ॥ पंपातिरासी आला त्वरित ॥ वटवृक्षातळीं रघुनाथ ॥ पहुडलासे श्रमोनियां ॥३५॥

स्फटिकशिळा दैदीप्यमान ॥ जेवीं शेषतल्पक शुभ्रवर्ण ॥ त्यावरी श्रावणारिनंदन ॥ विराजमान दिसतसे ॥३६॥

तंव त्या वटावरी हनुमंत ॥ कौतुकें करोनि उड्डाण करीत ॥ लक्षोनियां रघुनाथ ॥ हर्षें दावी वांकुल्या ॥३७॥

ऐसा देखानि वानर ॥ सौमित्रासी दावी रघुवीर ॥ पैल पाहें तो कपिवर ॥ पंचशर तोडरीं असे ॥३८॥

झळकताहे हेमकौपीन ॥ वज्रबंधन च चळे मदन ॥ माझें चित्त स्नेहेंकरून यासी देखोन भरलें असे ॥३९॥

मातेचें वचन हनुमंत ॥ आठवी तेव्हां हृदयांत ॥ जो ओळखे कौपीन गुप्त ॥ तोचि स्वामी तुझा असे ॥४०॥

तो प्रत्यया आला सकळ ॥ परी माझें अद्भुत बळ ॥ हा दिसतसे कोमळ ॥ तमाळनीळ साजिरा ॥४१॥

शिष्यापरीस आगळें बळ ॥ गुरूस असावें बहुसाल ॥ मग वटशाखा मोडोनि सबळ ॥ रामावरी टाकिली ॥४२॥

तें देखतां उर्मिलाजीवन ॥ चापासी वेगें चढविला गुण ॥ मग बोले कौसल्यानंदन ॥ स्थिर राहें नावेक ॥४३॥

बाळकौतुक पाहें साचार ॥ त्यावरी काय टाकिसी शर ॥ तों उताणा पहुडला रघुवीर ॥ तंव शाखा सत्वर आली वरी ॥४४॥

कोदंडदंडे ते अवसरीं ॥ शाखा ताडिती वरच्यावरी ॥ ते उडोनि गेली अंबरीं ॥ तृणतुल्य तेधवां ॥४५॥

आणीकही वृक्ष पाषाण ॥ वरी टाकी वायुनंदन ॥ तेही कौसल्यागर्भरत्न ॥ कोदंडेंकरून उडवित ॥४६॥

मग गर्जोनियां हनुमंत ॥ सोडी तेव्हां पंच पर्वत ॥ परी न उठेचि रघुनाथ ॥ कौतुकें हांसे ते काळीं ॥४७॥

मग रघुनाथें एक बाण ॥ चापासी लाविला न लागतां क्षण ॥ पांच पर्वत पिष्ट करून ॥ बाणें गगन भेदित ॥४८॥

शरपिसारा लागला किंचित ॥ तेणें उडोनि गेला हनुमंत ॥ गगनीं गरगरां भोंवत ॥ प्राण होत कासाविस ॥४९॥

वातचक्रीं पडतां तृण ॥ तें भूमीस न पडे मागुतेन ॥ त्यापरी वायुनंदन ॥ कासाविस होतसे ॥५०॥

अध्याय सतरावाश्लोक ५१ ते १००

जनक पवन धांवे ते समयीं ॥ आत्मज धरिला दृढ हृदयीं ॥ म्हणे बारे शरण लवलाहीं ॥ रामचंद्रासी जाईं कां ॥५१॥

हा अवतरला शेषशायी ॥ जाण क्षीराब्धीचा जांवई ॥ दृढ लागें त्याचे पायीं ॥ कायावाचामानसें ॥५२॥

मग श्रीरामासी हनुमंत ॥ येवोनी लोटांगण घालित ॥ मागुती उठोनि धरित ॥ श्रीरामचरण सप्रेमें ॥५३॥

उठोनियां रघुवीर ॥ हृदयी धरिला वायुकुमर ॥ एक जाहले हरिहर ॥ जयजयकार करिताती ॥५४॥

श्रीराम म्हणे हनुमंता ॥ जोंवरी शशी आणि सविता ॥ तोंवरी अक्षयी हो तत्वतां ॥ बलार्णव अद्भुत तूं ॥५५॥

कैकयीहस्तींचा पूर्ण पिंड ॥ अंजनीहातीं पडला अखंड ॥ तो हा वीर जन्मला प्रचंड ॥ राघवाहून पूर्वीच ॥५६॥

असो जोडोनि दोनी कर ॥ हनुमंत उभा राहे समोर ॥ म्हणे हे राम करुणासमुद्र ॥ जगदुद्धार दीनबंधु ॥५७॥

हे राम भुवनसुंदरा ॥ हे राम जनकजावरा ॥ हे राम नवपंकजनेत्रा ॥ पुराणपुरुषा जगदात्मया ॥५८॥

परम भक्त जाणोन ॥ हनुमंतासी भेटला लक्ष्मण ॥ करीं धरून वायुनंदन ॥ सीतावल्लभें बैसविला ॥५९॥

रामचरण चुरी मारुति ॥ म्हणे रघुवीरा ऐक एक विनंती ॥ पैल ऋष्यमूक पर्वतीं ॥ वसे कपिपति सुग्रीव ॥६०॥

अभयवर देशील त्यातें ॥ तरी आतां भेटवीन तयातें ॥ बहुत कार्य तयाचेनि हातें ॥ पुढें साधेल श्रीरामा ॥६१॥

मग बोले रघुनंदन ॥ सुग्रीव हा कोणाचा कोण ॥ हनुमंत सांगे पूर्वकथन ॥ सावधान परिसावें ॥६२॥

कमलोद्भव करितां ध्यान ॥ प्रेमोदकबिंदु नेत्रींहून ॥ अंजुळींत पडतांचि पूर्ण ॥ ऋक्षरजा जन्मला ॥६३॥

तो ब्रह्मयाचा प्रियनंदन ॥ वानरवेष बळ गहन ॥ हिंडतां वनोपवन ॥ शिवलोकाप्रति गेला ॥६४॥

तंव देखिलें रम्य सरोवर ॥ भोंवते सदाफळ तरुवर ॥ परी तेथें शाप दुर्धर ॥ अपर्णेचा होता पूर्वीं ॥६५॥

जो नर सेवील येथींचें पाणी ॥ तो नारी होईल तत्क्षणीं ॥ हें ऋक्षराजें नेणोनी ॥ उडी जीवनीं घातली ॥६६॥

स्नान करून निघतां बाहेर ॥ जाहलें स्त्रियेचें शरीर ॥ रंभेहून परम सुंदर ॥ होय विचित्र ते काळीं ॥६७॥

तों मित्र इंद्र दोघेजण ॥ आले सुंदर स्त्री वरूं म्हणोन ॥ तंव तो ब्रह्मपुत्र लाजोन ॥ स्त्री होऊन बैसला ॥६८॥

न घडे तयेसीं सुरत ॥ मग दोघीं त्यागिलें रेत ॥ आधीं शक्रवीर्य मस्तकीं पडत ॥ वाळी तेथें जन्मला ॥६९॥

मागून सूर्यवीर्य पडलें ग्रीवेवरी ॥ तेथें सुग्रीव जन्मला ते अवसरीं ॥ विरिंचि पातला झडकरी ॥ तों पुत्र नारी जाहला असे ॥७०॥

मग तेणें प्रार्थोनि पार्वती ॥ उःशाप मागे पुत्राप्रती ॥ कामिनीभाव हरोनि मागुती ॥ पुत्र केला पूर्ववत ॥७१॥

दोघे पौत्र आणि सुत ॥ घेवोनि चालिला पद्मजात ॥ मग मृत्युलोकीं अद्भुत ॥ किष्किंधा नगर रचियेलें ॥७२॥

धाकुटा सुग्रीव वडील वाळी ॥ ऋक्षरजा घेऊनि ते काळीं ॥ किष्किंधाराज्य भूमंडळीं ॥ केलें तेणें बहुकाळ ॥७३॥

वाळी सुग्रीवासी तत्वतां ॥ ऋक्षरजा मातापिता ॥ पुढें वाळीस देऊन राज्यार्था ॥ धरिलें छत्र सुमुहूर्तें ॥७४॥

करोनियां योगसाधन ॥ ऋक्षरजा पावला ब्रह्मसदन ॥ पुढें वाळी सुग्रीव दोघेजण ॥ बंधु समान सारिखे ॥७५॥

इंद्रे वाळीस विजयमाळ ॥ दीधली म्हणोनि तो सबळ ॥ समरीं शत्रु होय निर्बळ ॥ वाळीप्रताप देखतां ॥७६॥

सूर्यें सुग्रीव करीं धरिला ॥ आणोन माझे हाती दीधला ॥ तूं सांभाळीं यासी दयाळा ॥ म्हणोनियां प्रार्थिलें ॥७७॥

सुग्रीव आणि वाळीमध्यें ॥ वैर लागलें राज्यसंबंधें ॥ पुढें वाळी सुग्रीवासि क्रोधें ॥ वधावयासी धांविन्नला ॥७८॥

सुग्रीवाची स्त्री रुमा रूपवंत ॥ वाळीनें घातली घरांत ॥ सुग्रीवें धरिला ऋष्यमूक पर्वत ॥ युद्ध होत षण्मासां ॥७९॥

माझी सूर्यें घेतली भाक ॥ तूं सुग्रीवाची पाठी राख ॥ ऐसें ऐकतां अयोध्यानायक ॥ काय बोलता जाहला ॥८०॥

हनुमंता भाक घे पूर्ण ॥ मज अत्यंत प्रिय सूर्यनंदन ॥ सत्वर आणि बोलावून ॥ भेटीस मन उताविळ ॥८१॥

तयाचा शत्रु वधोन ॥ त्यासी देईल छत्र सिंहासन ॥ याउपरी जानकी चिद्रत्र ॥ शोधूनि काढूं साक्षेपें ॥८२॥

ऐसें बोलतां जनकजामात ॥ तेथून उडाला हनुमंत ॥ येऊनि सुग्रीवास सांगत ॥ भाग्य अद्भुत उदेलें ॥८३॥

सीतावियोगें दुःखी रघुराज ॥ रुमावियोगें दुःखी तूं सहज ॥ तरी एकमेकाचें पूर्ण काज ॥ करा आतां परस्परें ॥८४॥

एकोनि मारुतीचें वचन ॥ आनंदें नाचे सूर्यनंदन ॥ हनुमंतातें आलिंगून ॥ पाठी हातें थोपटी ॥८५॥

रघुनाथप्राप्तीसी तत्वतां ॥ तूं सद्रुरु होय हनुमंता ॥ उतराई काय होऊं आतां ॥ उपकार तत्वतां न विसरें ॥८६॥

दशरथामज रघुपति ॥ त्याची किर्ति पूर्वीं ऐकिली होती ॥ पंचवटीस करोनि वस्ती ॥ पिशिताशन मारिले ॥८७॥

असो घेऊन वानरांचे भार ॥ नळ नीळ जांबुवंत वीर ॥ सुग्रीव आला जेथें रघुवीर ॥ त्रिभुवनसुंदर देखिला ॥८८॥

कोट्यानुकोटी मीनकेतन ॥ ज्यावरून सांडावे ओंवाळून ॥ तमालनीळ स्वरूप सगुण ॥ सुग्रीवें नेत्रीं विलोकिला ॥८९॥

लोटांगण घाली सुग्रीव ॥ नळ नीळादि वानर सर्व ॥ ऐसें देखोनि सीताधव ॥ पुढें धांवत भेटावया ॥९०॥

धरोनियां दोनी कर ॥ उठविला स्वयें भानुकुमर ॥ हृदयीं धरितां रघुवीर ॥ सुख अपार सुग्रीवा ॥९१॥

अत्यंत जाहला क्षुधातुर ॥ तया भेटला क्षीरसागर ॥ कीं दरिद्रियासी अपार ॥ द्रव्य घरीं सांपडलें ॥९२॥

कीं आळशाचें गृह शोधित ॥ कल्पवृक्ष आला अकस्मात ॥ की चुकलें बाळक भेटत ॥ जननीयेसी प्रीतीनें ॥९३॥

कीं तृषाक्रांत पडिला वनीं ॥ त्यापुढें लोटे मंदाकिनी ॥ तैसा सुग्रीवाचे मनीं ॥ ब्रह्मानंद उचंबळला ॥९४॥

जीव शिव एक भाव ॥ तैसें भेटीचें वैभव ॥ तेव्हां विमानारूढ देव ॥ सुमनसंभार वर्षती ॥९५॥

नळ नीळ जांबुवंत ॥ आणिक वानर समस्त ॥ तयांसी रघूत्तम आलिंगित ॥ आनंद गगनीं न समाये ॥९६॥

हनुमंतें तये वेळे ॥ पसरिले वृक्षडाहाळे ॥ मध्यें अग्नीसि साक्ष ठेविलें ॥ दोहींकडे बैसविले दोघेजण ॥९७॥

सुग्रीव आणि रघुनाथ ॥ उभयतांस म्हणे हनुमंत ॥ एकमेकांचा कायार्थ ॥ साह्य होऊनि साधावा ॥९८॥

रघुवीर म्हणे राज्य आणि दारा ॥ सोडवूनि देतों रविकुमरा ॥ हा माझा निर्धार खरा ॥ उदयीकचि पहाल ॥९९॥

अर्कज म्हणे जेणें नेली सीता ॥ त्यासी संहारून तत्वतां ॥ अयोध्येसी नेईन रघुनाथा ॥ मंगळभगिनीसहित पैं ॥१००॥

 

अध्याय सतरावाश्लोक १०१ ते १५०

ऐसें ऐकतां उत्तर ॥ भुभुःकारें गर्जती वानर ॥ तेणें नांदें अंबर ॥ दणाणलें ते समयीं ॥१॥

सुग्रीव म्हणे रघुनंदना ॥ कालचि एक सुंदर ललना ॥ राक्षस घेऊन गेला जाणा ॥ निराळमार्गें त्वरेनें ॥२॥

आम्ही समस्त देखिली नयनीं ॥ आक्रंदत करुणावचनीं ॥ म्हणे रामा धांव निर्वाणीं ॥ चापपाणि करुणाकरा ॥३॥

क्षणभरि म्हणे सौमित्रा ॥ धांव धांव परम पवित्रा ॥ मागुती म्हणे स्मरारिमित्रा ॥ राजीवनेत्रा धांव वेगीं ॥४॥

तिनें उत्तरीय वस्त्र फाडोनी ॥ आभरणें टाकिलीं बांधोनी ॥ आम्हीं तीं ठेविलीं जतन करूनि ॥ राम ऐकोनि विस्मित ॥५॥

म्हणे नवल सांगती वानर ॥ सत्वर आणिले अलंकार ॥ घेऊनि आला वायुकुमर ॥ देत रघुवीराकरीं तेव्हां ॥६॥

तंव लवलाहें ग्रंथि सोडित ॥ आभरणें ओळखिलीं समस्त ॥ अहा प्रिये म्हणोनि रघुनाथ ॥ टाकी शरीर धरणीवरी ॥७॥

हृदयीं धरोनि अलंकार ॥ शोकार्णवीं पडला रघुवीर ॥ सद्रद होती समस्त वानर ॥ नयनीं नीर लोटलें ॥८॥

आठवोनी सीतेचे गुण ॥ विलाप करी रघुनंदन ॥ धांवोनियां लक्ष्मण ॥ धरी चरण रघुपतीचे ॥९॥

सौमित्रासी म्हणे रघुवीर ॥ सखया ओळखें अलंकार ॥ राम म्हणे निरंतर ॥ जनकजा आंगीं होते ते ॥११०॥

सौमित्रें अलंकार घेऊनि ॥ सादर होऊनि पाहे नयनीं ॥ म्हणे हीं नेपुरें सीतेचे चरणीं ॥ ओळखलीं म्यां साच पैं ॥११॥

नेपुरें ओळखिली साचार ॥ वरकड नेणें मी अलंकार ॥ राम म्हणे निरंतर ॥ जनकात्मजा लेत होती ॥१२॥

सौमित्र म्हणे सीता माउली ॥ म्यां कधीं नाहीं विलोकिली ॥ त्रिकाळ नमनाचे वेळीं ॥ नेपुरें चरणीं देखिली म्यां ॥१३॥

ऐसें बोलतां लक्ष्मण ॥ आनंदला रघुनंदन ॥ म्हणे बा रे तूं दिव्य रत्न ॥ वैराग्यवैरागरींचें ॥१४॥

तूं भक्तसरोवरींचा राजहंस ॥ कीं ज्ञानमुक्ताफळमांदुस ॥ कीं शत्रुविपिनहुताश ॥ सदा निर्दोष सूर्य जैसा ॥१५॥

सुग्रीव म्हणे रविकुळमंडणा ॥ जरी जानकी तुज भेटवींना ॥ तरी मी भोगीन यमयातना ॥ कल्पपर्यंत निर्धारें ॥१६॥

नळ नीळ जांबुवंत ॥ माझे प्रधान जगविख्यात ॥ भूगोल हा क्षण न लागत ॥ उचलोनि घालिती पालथा ॥१७॥

आतां रघुपति तुझी आण ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ शोधून ॥ जानकी आणीन हें प्रमाण ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१८॥

मग बोले मखपाळण ॥ तुज तारा राज्य दिधल्यावांचून ॥ सीताशुद्धि न करीं आण ॥ श्रावणारीची जाण पां ॥१९॥

तुझें कार्य न होतां आधीं ॥ कदा न करीं मी सीताशुद्धि ॥ ही माझी प्रतिज्ञा त्रिशुद्धि ॥ ती काळत्रयीं टळेना ॥१२०॥

गुरुकृपेंवीण ज्ञान ॥ कीं आवडीविण भजन ॥ कीं प्रेमाविण कीर्तन ॥ स्नानेंविण अनुष्ठान जैसें ॥२१॥

कीं अतिथीविण भोजन ॥ कीं वीरश्रीविण रण ॥ कीं विप्र जैसा विद्येविण ॥ सर्व जन निंदिती ॥२२॥

तैसें तुझें कार्य न होतां ॥ सीताशुद्धि न घें सर्वथा ॥ ऐसें बोलतां रघुनाथा ॥ वीरश्री आंगीं दाटली ॥२३॥

चढविला चापासी गुण ॥ म्हणे बोलावी शक्रनंदन ॥ सुग्रीव धांवोनि धरी चरण ॥ कर जोडोनि विनवित ॥२४॥

म्हणे वाळीचा मार अनिवार ॥ आपण युद्ध न करावें समोर ॥ अकस्मात टाकिजे शर ॥ तरी संहार होय पैं ॥२५॥

मंगळजननी जामात ॥ सुग्रीवासी पुसे वृत्तांत ॥ वाळीसी तुज वैर अद्भुत ॥ काय कारण पडावया ॥२६॥

सुग्रीव सांगे पूर्व वृत्तांत ॥ म्हैसासुर नामें दैत्य अद्भुत ॥ त्याचा दुंदुभि वीर्यजात ॥ परम बलिष्ठ जन्मला ॥२७॥

महा उन्मत्त मद्यपानी ॥ कलह माजवावया हिंडे वनीं ॥ परी त्यासी समरांगणीं ॥ युद्धा कोणी भेटेना ॥२८॥

मग दैत्य गेला यमाजवळी ॥ म्हणे मजसीं मांडी युद्धफळी ॥ येरू म्हणे किष्किंधेसीं वाळी ॥ त्याजवळी जाय वेगीं ॥२९॥

ऐकोनि आला किष्किंधेजवळी ॥ जैसा मूषक निघे व्याळबिळीं ॥ कीं व्याघ्राची पहावया जाळी ॥ जंबुक जैसा पातला ॥१३०॥

दैत्य हांक फोडी तयेवेळीं ॥ ऐकतां धांविन्नला वीर वाळी ॥ जैसा मृगेंद्र कव घाली ॥ मातंग दुरी देखतां ॥३१॥

शत योजनें शरीर विशाळ ॥ वाळीनें पदीं धरिला तात्काळ ॥ भूमीवरी आपटिला सबळ ॥ भूमंडळ दणाणिलें ॥३२॥

कायेंतून गेला प्राण ॥ मग प्रेत त्याचें परम पवित्रा ॥ भवंडोन ॥ रागें दिधलें भिरकावून ॥ ऋष्यमूक पर्वतावरी ॥३३॥

शतयोजनें कलेवर ॥ ऋषीचें आश्रम मोडले समग्र ॥ तेथें मुख्य मातंग ऋषीश्र्वर ॥ तेणें शाप दीधला ॥३४॥

या पर्वता स्पर्शतां शक्रनंदन ॥ तात्काळ जाईल त्याचा प्राण ॥ दुंदुभीचें प्रेत जाण ॥ पडलें आहे अद्यापि ॥३५॥

मग मयासुर दुंदुभीचा सुत ॥ पितृसूड घ्यावया त्वरित ॥ पतंग अग्नीस मागत ॥ सूड खांडववनाचा ॥३६॥

सर्पाचा सूड समूळभं ॥ सुपर्णासी मागे अळी ॥ तैसा मयासुर ते काळीं ॥ बाहे वाळीस युद्धातें ॥३७॥

शक्रसुत धांविन्नला त्वरित ॥ जैसे पर्वतावर वज्र पडत ॥ तैसा मयासुर मुष्टिघात ॥ देतां वर्मित रक्तासी ॥३८॥

पाताळविवरद्वारें ॥ मयासुर पळाला त्वरें ॥ त्याचे पाठीमागें शक्रकुमारें ॥ धांव घेतली पाताळा ॥३९॥

विवरद्वारीं मी रक्षण ॥ राघवा बैसलों बहुत दिन ॥ तों यक्ष गंधर्व मिळून ॥ किष्किंधा घेऊं धांविन्नले ॥४०॥

रायाविण कोण राखे पुरी ॥ धाकें दुर्ग ओलांडिले वानरीं ॥ प्रधान प्रजा ते अवसरीं ॥ मज सांगती गाऱ्हाणें ॥४१॥

मग विवरमुखीं ठेविला पर्वत ॥ किष्किंधेस पातलों त्वरित ॥ शत्रु आटोनि समस्त ॥ प्रजा सुखी राखिल्या ॥४२॥

विंशति मासपर्यंत ॥ वाळी विवरीं जाहला गुप्त ॥ मग प्रधान प्रजा समस्त ॥ म्हणती शक्रसुत निमाला ॥४३॥

सकळीं आग्रह करून बळें ॥ राजछत्र मज दिधलें ॥ तों मयाचें शिर घेऊनि ते वेळे ॥ वाळी वीर पातला ॥४४॥

वीस मास तो निराहार ॥ दृष्टीं न दिसे विवरद्वार ॥ परम उतरला मुखचंद्र ॥ घाबरा वीर जाहला ॥४५॥

उगवला असतां उष्णकर ॥ किंचित् दिसों लागलें द्वार ॥ मग नखाग्रेंच नग समग्र ॥ उलथोनियां पाडिला ॥४६॥

हर्षें गर्जना केली थोर ॥ तेणें नांदावलें अंबर ॥ परी मजलागीं चिंता अपार ॥ बहु जाहली ते काळीं ॥४७॥

म्हणे बंधु दैत्यांनीं मारिला ॥ घाबरा किष्किंधेसी पातला ॥ तों मज राज्यपदीं देखिलें डोळां ॥ परम क्षोभला ते काळीं ॥४८॥

गुरु त्यजिजे ज्ञानहीन ॥ प्रीतीविणें मित्रजन ॥ ऐसें बोलोनि शक्रनंदन ॥ शस्त्र घेवोनि धांविन्नला ॥४९॥

मग हे नळ नीळ जांबुवंत ॥ प्राणसखा माझा हनुमंत ॥ मज घेऊन पळाले त्वरित ॥ ठाव निश्र्चित नेदी कोणी ॥१५०॥

अध्याय सतरावाश्लोक १५१ ते २१५

हिरोनि घेतली बळेंचि दारा ॥ नित्य येऊनि करी मारा ॥ मग ऋष्यमूकपर्वतीं सीतावरा ॥ केला थारा आम्ही येथें ॥५१॥

वाळीस असे येथें शाप ॥ यालागीं राहों सुखरूप ॥ सामासां युद्ध अमूप ॥ दोघांसी होत रघुत्तमा ॥५२॥

आम्हां दोघां समान बळ ॥ परी त्याचे गळां विजयमाळ ॥ तेणें त्याचा प्रताप सबळ ॥ शत्रूंसी पळ सुटतसे ॥५३॥

विकट विषम ताल सात ॥ एकेच बाणें जो छेदी निमिषांत ॥ त्याचे हातें वाळीस मृत्य ॥ भविष्य पूर्वीं केलें हें ॥५४॥

ऐसें बोलतां सूर्यसुत ॥ धनुष्य योजी अवनिजाकांत ॥ अर्धचंद्र बाण त्वरित ॥ आकर्णवरी ओढिला ॥५५॥

मांडी दृढ देहुडें ठाण ॥ पाठीसी उभा लक्ष्मण ॥ त्याचा चरणांगुष्ठ रघुनंदन ॥ पायांखालीं रगडीत ॥५६॥

दडपितां शेषचरणांगुष्ठ ॥ सप्तही ताड जाहले नीट ॥ एकाचि बाणें सपाट ॥ सातही केले राघवें ॥५७॥

सात ताड शेषपृष्ठीवरी ॥ यालागीं निटावले झडकरी ॥ तों दुंदुभीचें प्रेत ते अवसरीं ॥ मित्रसुतें दाखविलें ॥५८॥

हें जो उचलील पुरुषार्थी ॥ वाळीचा मृत्य त्याचे हातीं ॥ चरणांगुष्ठें रघुपति ॥ प्रत ढकली तेधवां ॥५९॥

तेंही तृणप्राय उडोन ॥ पडिलें दिगंतरीं जाण ॥ अद्भुत प्रताप देखोन ॥ सुग्रीव चरणीं लागला ॥१६०॥

मग म्हणे चापपाणी ॥ सुग्रीवा तूं किष्किंधेसी जाऊनि ॥ वाळीतें पाचारूनि आणीं ॥ समरांगणीं युद्धातें ॥६१॥

ऐसें ऐकोनि यथार्थ ॥ सुग्रीवासी आवेश बहुत ॥ म्हणे त्यासी वधील हा निश्र्चित ॥ यदर्थीं संशय असेना ॥६२॥

कमलदलाक्ष कृपाघन ॥ वर्षे स्वानंदामृत जीवन ॥ तें कर्णद्वारें सेवून ॥ सूर्यसुत तृप्त जाहला ॥६३॥

रामचंद्रें अमृताबिंदु टाकिले ॥ तेणें सुग्रीवकर्णचकोर धाले ॥ कीं ते कर्णयाचकतृप्त जाहले ॥ श्रीरामवचननिधानें ॥६४॥

मग तो घासरमणीचा सुत ॥ दशकंठरिपूस विनवित ॥ म्हणे विषकंठवंद्या एक हेत ॥ पूर्ण माझा करीं कां ॥६५॥

तरी अकस्मात टाकोनि बाण ॥ घ्यावा जी वाळीचा प्राण ॥ अवश्य म्हणे जगन्मोहन ॥ भक्त वचनपाळक जो ॥६६॥

मग किष्किंधेसमीप सूर्यकुमर ॥ करीत थोर भुभुःकार ॥ दणाणिलें अवघे नगर ॥ इंद्रपुत्र दचकला ॥६७॥

गळां घालोनि विजयमाळ ॥ वेगीं धांविन्नला वाळी सबळ ॥ म्हणे अरीचा आजि थोर कल्लोळ ॥ कोण साह्य जाहला असे ॥६८॥

तारा म्हणे स्वामी परियेसीं ॥ अंगद गेला होता पारधीसी ॥ तेथें बोलत होते ऋषी ॥ राम सुग्रीवा साह्य जाहला ॥६९॥

तरी राजेंद्रा अवधारा ॥ आपण न जावें समरा ॥ म्हणोन चरणीं लागली तारा ॥ परी शक्रकुमर न माने तें ॥१७०॥

ऐकोनि कुंजराचें गर्जन ॥ कैसा उगा राहे पंचानन ॥ मृग बळेंचि आला चालोन ॥ मग शार्दुळ कैसा स्थिरावे ॥७१॥

शुष्क काननीं प्रळयाग्नी ॥ कैसा राहील शांति धरून ॥ असो सहस्राक्षनंदन ॥ तारेप्रति बोलिला ॥७२॥

म्हणे प्राणप्रिये परियेसीं ॥ षण्मासां येतो युद्धासी ॥ आजि आला तिसरे दिवशीं ॥ उल्हासेंसी गर्जत ॥७३॥

घायीं शरीर त्याचें जर्जर ॥ तैसें माझेंही जाहलें चूर ॥ त्यासी साह्य वायुकुमर ॥ तेणें वीर आणिला कोणी ॥७४॥

तरी तारे तूं आणि अंगद ॥ सुखें भोगा राज्यपद ॥ आजि सुग्रीवाचा करीन वध ॥ तरीच येईन माघारा ॥७५॥

नाहीं तरी भेठ हेचि ॥ बोलोन वाळी उठे तैसाचि ॥ जैसी उडी पंचाननाची ॥ मातंगासी लक्षोनियां ॥७६॥

जैसा पर्वतावरी पर्वत पडला ॥ तैसा सुग्रीवावरी आदळला ॥ आवेशें झगडती ते वेळां ॥ कांपों लागली धरित्री ॥७७॥

मल्लयुद्ध होता अनिवार ॥ गुप्त पाहे अवनिजावर ॥ तों दोघे सारिखे दिसती वीर ॥ कोणावरी शर टाकावा ॥७८॥

मारुति म्हणे अयोध्यापति ॥ हे दोघे एकसारिखे दिसती ॥ मग सुमनहार त्वरितगती ॥ समीरसुतें गुंफिला ॥७९॥

सुग्रीवाचे गळां घालीं ते क्षणीं ॥ विलोकित कैवल्यदानी ॥ दोघे हांक देत गगनीं ॥ प्रतिध्वनी उठताती ॥१८०॥

वज्राऐसे कठोर ॥ हाणिती तेव्हां मुष्टिप्रहार ॥ भूगोळ कांपत समग्र ॥ दणाणित पाताळें ॥८१॥

शत योजनें झाडें उपडोनि ॥ निजबळें घालिती उचलोनि ॥ उसळें तरू धांवती गगनीं ॥ विमानें पळविती देव पैं ॥८२॥

चक्राकार फिरविती पर्वत ॥ न कळतां टाकिती अकस्मात ॥ क्षणक्षणां भूकंप होत ॥ ग्रीवा सरसावी भोगींद्र ॥८३॥

हृदयीं समर्पित वज्रमुष्टी ॥ तेणें उडुगणांची होत वृष्टी ॥ गगनीं देवांचियां थाटी ॥ युद्ध दृष्टीं विलोकिती ॥८४॥

असो सहस्राक्षाचा सुत ॥ सुग्रीवासी हाणी मुष्टिघात ॥ कासावीस सूर्यसुत ॥ मागें पाहत रामाकडे ॥८५॥

वीर सांपडतां रणमंडळीं ॥ बंधूची वाट पाहे ते वेळीं ॥ तैसा सुग्रीव हृदयकमळीं ॥ दीनबंधूतें आठवी ॥८६॥

म्हो कां न सरे माझा भोग ॥ कृपा न करी अवनिजारंग ॥ जो विषकंठहृदयपद्मभृंग ॥ दशकंठदर्पदमन जो ॥८७॥

असो इकडे कौसल्यानंदन ॥ तूणीरांतून काढी दिव्य बाण ॥ जैसी कल्पांत मेघांतून ॥ चपळा बाहेर निघे पैं ॥८८॥

धनुष्यावरी लावून बाण ॥ लक्ष साधिलें दुरोन ॥ वाळीचे हृदयीं येऊन ॥ अकस्मात खडतरला ॥८९॥

बाण लागला सतेज ॥ जैसी गिरिवरी पडे वीज ॥ कीं काद्रवेय देखतां अरुणानुज ॥ येऊन झडपी जैसा कां ॥१९०॥

कीं अभाग्यावरी धाड पडे ॥ राहुमुखीं शशी सांपडे ॥ कीं तपस्वियावरी सांकडें ॥ व्यसन नसतेंचि आदळे ॥९१॥

कीं तृतीयनेत्रींचा अग्न ॥ मन्मथावरी पडे येऊन ॥ तैसा वाळीचे हृदयीं बाण ॥ एकाएकीं संचरला ॥९२॥

महावृक्ष उन्मळिला ॥ कीं पर्वत भूमीवरी आदळला ॥ तैसा वाळीनें देह टाकिला ॥ भूमंडळीं ते काळीं ॥९३॥

वाळीचा देहांत जाणोनी ॥ जवळी आला चापपाणी ॥ इंद्रतनुज ते क्षणीं ॥ काय बोलता जाहला ॥९४॥

तूं क्षत्रिय एकपत्नीव्रती ॥ दुसरी वरिली कां अपकीर्ति ॥ अन्याय नसतां रघुपती ॥ बाण कां व्यर्थ टाकिला ॥९५॥

तूं सत्यवचनी यशवंत ॥ महाप्रतापी रणपंडित ॥ तुझी अपकीर्ति त्रिभुवनांत ॥ जाहली सत्य राघवेशा ॥९६॥

न हटकितां टाकिला शर ॥ मग बोले जानकीवर ॥ मर्कटा तूं केवळ वनचर ॥ तुज कासया हटकावें ॥९७॥

वीर असेल त्यासि हटकावें ॥ वनचरांसी गुप्तचि वधावें ॥ पारधियें मृग साधावे ॥ पाचारावें कासया ॥९८॥

तूं परम अन्यायी वानर ॥ बंधुस्त्रीअभिलाषी अनाचार ॥ म्यां दुष्ट दंडावया अवतार ॥ घेतला असे मर्कटा ॥९९॥

ऐसें ऐकतां ते काळीं ॥ हृदयीं सद्रद जाहला वाळी ॥ म्हणे मी पावन झालों ये वेळीं ॥ तुझेनि हस्तें राघवा ॥२००॥

थोर सुकृताचे पर्वत ॥ दृष्टीभरी देखिला रघुनाथ ॥ माझें सार्थक झालें यथार्थ ॥ नाहीं अंत निजभाग्या ॥१॥

येच मार्गीं जनकनंदिनी ॥ दश्ग्रीव गेला घेउनी ॥ मी त्यासी आणितों बांधोनी ॥ एक क्षण न लागतां ॥२॥

कक्षेमाजीं दाटून ॥ चतुःसमुद्रीं केलें स्नान ॥ पालखावरी आणोन ॥ अंगदाच्या बांधिला ॥३॥

मग पौलस्तीनें भिक्षा मागून ॥ नेला दशकंठ सोडवून ॥ त्या मशकाचा पाड कोण ॥ काय उशीर आणावया ॥४॥

माझें कर्म परम बळी ॥ तुझी सेवा नाहीं घडली ॥ राजीववाक्ष ते वेळीं ॥ स्नेहाळपणें बोलिला ॥५॥

तुझे हृदयींचा उपटोनि बाण ॥ आतां तुज सावध करीन ॥ मग म्हणे इंद्रनंदन ॥ ऐसें मरण पुढें नये ॥६॥

तुझेंनि हातें देहांत ॥ तूं दृष्टीपुढें रघुनाथ ॥ ऐसें बोलतां शक्रसुत ॥ सुग्रीव जवळी पातला ॥७॥

नेत्रीं स्रवती जळबिंदु ॥ उचंबळला शोकसिंधु ॥ मग वाळीनें तो कनिष्ठबंधु ॥ प्रीतीनें जवळी बैसविला ॥८॥

काढोनियां विजयमाळा ॥ घातली सुग्रीवाचे गळां ॥ म्हणे धन्य धन्य अनुजा वेल्हाळा ॥ दृष्टीं दाविला श्रीराम ॥९॥

धन्य धन्य तुझें वैर ॥ अंतीं दाविला रघुवीर ॥ वैर नव्हे हा स्नेह थोर ॥ मजलागीं तुवां केला ॥२१०॥

आतां रघुनाथसेवा प्रीतीं ॥ तुम्ही करावी अहोरातीं ॥ साह्य होऊनि सर्वाथीं ॥ सीतासती सोडविजे ॥११॥

ऐसें शक्रतनुज बोलोन ॥ विलोकिलें राघवध्यान ॥ तात्काळ देह सोडून ॥ वाळी जाहला विदेही ॥१२॥

विष्णुदूत येऊन ॥ नेला विमानीं बैसवून ॥ याउपरी तारेचें समाधान ॥ रघुनंदन करील पैं ॥१३॥

ते सुरस कथा अपार ॥ संतीं परिसावी सादर ॥ ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अभंग चरित्र वर्णील हें ॥१४॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

सप्तदशाध्याय गोड हा ॥२१५॥

ओंवीसंख्या ॥२१५॥

॥श्रीरामचंद्रापर्णमस्तु॥

श्रीरामविजयअध्याय १८ वा

अखिलरघुनाथगुणसमुद्र ॥ रामउपासक तेथें जळचर ॥ ब्रह्मानंदें क्रीडती साचार ॥ प्रेमबळें मातोनियां ॥१||

स्वानंदाचे उमाळे देती ॥ सारासारविचारें तळपती ॥ जीवनावांचोनि गति ॥ दुजी नसे तयांतें ॥२॥

अविद्याविपिन शुष्क बहुत ॥ कांहींच वासना न करी तेथ ॥ नंदनवनींचा मिलिंद सत्य ॥ अर्कींपुष्पीं बैसेना ॥३॥

जो करी सुधारसपान ॥ तो कंटाळे देखोनि वमन ॥ जेणें आत्मशयनीं केलें शयन ॥ तो भवकानन कां सेवी ॥४॥कल्पद्रुम ज्याचे अंगणीं ॥ नित्य सुरभी दुभे सदनीं ॥ तो तृणबीज काढोनी ॥ कदाकाळीं भक्षीना ॥५॥

प्रारब्धयोगें वावरे शरीर ॥ ते विषयीं न धरिती आदर ॥ तैसे रघुवीर भजनीं सादर ॥ हेंही नेणती कदा ते ॥६॥

सतरावे अध्यायी गतकथार्थ ॥ श्रीरामें मारिला शक्रसुत ॥ सुग्रीव उसां मांडी देत ॥ देहांतसमयीं वाळीच्या ॥७॥

तों अंगदसमवेत तारा सती ॥ सत्वर पातली जेथें पति ॥ मग म्हणे अयोध्यापति ॥ काय ऐसें केलें तुवां ॥८॥

आतां टाकोनि एक बाण ॥ राघवा घेई माझा प्राण ॥ मी पतिसमागमें जाईन ॥ काय वांचोनि व्यर्थ आतां ॥९॥

कवळोनि वाळीचें प्रेत ॥ तारा अत्यंत शोक करीत ॥ ऐसें जाणोनि जनकजामात ॥ काय बोले तें ऐका ॥१०॥

कोण्या अर्थालागीं देख ॥ तारे तूं करिशी शोक ॥ येरी म्हणे पतिवियोगपावक ॥ तेणें दग्ध जाहल्यें मी ॥११॥

ताटिकांतक म्हणे ते काळीं ॥ कलेवराचें नाम वाळी ॥ तरी तें पडलें तुजजंवळी ॥ जैसें तैसें संचलें ॥१२॥

ज्यालागीं शोक करिसी बहुत ॥ तरी तें पडलें वाळीचें प्रेत ॥ येरी म्हणे हृदयस्थ ॥ आत्मा गेला निघोनियां ॥१३॥

मग बोले अयोध्याविहारी ॥ तूं काय आत्म्याची अंतुरी ॥ कीं शरीराची निर्धारीं ॥ सांगें मज विचारोनि ॥१४॥

शरीर तंव नाशिवंत ॥ आत्मा अविनाश शाश्र्वत ॥ तरी शोक करावा किमर्थ ॥ पाहें बरवें विचारोनि ॥१५॥

जैसा घटीं आणि रांजणीं ॥ एक बिंबला वासरमणी ॥ तैसा स्त्रीपुरुष अभिधानीं ॥ आत्मा एक अव्यंग ॥१६॥

घट मठ मोडितां निःशेष ॥ जेवीं न मोडेचि आकाश ॥ कीं तरंग मोडतां सागरास ॥ नाश नसे सहसाही ॥१७॥

मायामय लटिका खेळ ॥ जैसें नसतां दिसे मृगजळ ॥ कीं गंधर्वनगर केवळ ॥ मिथ्या भास आभासे ॥१८॥

सुधापानी स्वर्गी असती ॥ तेही नाश पावती कल्पांतीं ॥ जें जें दिसे आकाररीतीं ॥ नाश निश्र्चितीं असे तेथें ॥१९॥

भग्नपात्रीचें गेलें नीर ॥ माजी बिंबला राहिणीवर ॥ तो न दिसे म्हणोनि अपार ॥ शोक करी अज्ञानी ॥२०॥

मळे पिकवीन अपार ॥ यालागीं इच्छी रोहिणीनीर ॥ तें अदृश्य होतां साचार ॥ शोक करिती मूर्खत्वें ॥२१॥

सकळ पिंडांसमवेत ॥ ब्रह्मांड अवघें मिथ्याभूत ॥ आत्मा अक्षय शाश्र्वत ॥ शोक किमर्थ करिसी तूं ॥२२॥

ऐशीं रावणारीचीं वचनें ॥ अमृताहून गोड गहनें ॥ कीं बोधसमुद्रींचीं चिद्रत्नें ॥ तारेलागीं दीधलीं ॥।२३॥

कीं तीं विश्रांतीची मंदिरें ॥ कीं अनुभवभींचीं नक्षत्रें ॥ कीं स्वानंदाचीं पात्रें ॥ मुखावरी उचंबळती ॥२४॥

कीं रामवचन अगस्ति थोर ॥ शोषिला तिचा शोकसागर ॥ कीं वचनरूपें दिनकर ॥ अज्ञानतिमिरनाशक ॥२५॥

मदनारीमित्राचे चरण ॥ तारेनें धरिले प्रीतीकरून ॥ श्र्वासोच्छ्वास टाकून ॥ तटस्थरूपें राहिली ॥२६॥

श्रीराम म्हणे तारेलागून ॥ माझें वचन मानीं प्रमाण ॥ सुग्रीवासी माळ घालून ॥ सुखेंकरून वर्तावें ॥२७॥

तारा म्हणे चापपाणी ॥ हे वेदविरुध्द दिसे करणी ॥ मग म्हणे कैवल्यदानी ॥ वचन मानीं माझें हें ॥२८॥

तूं पतिव्रतांमाजीं विख्यात ॥ तारे होशी यथार्थ ॥ अघटित घडवी रघुनाथ ॥ महिमा अद्भुत जयाचा ॥२९॥

देवाचें अघटित आचरण ॥ तें मानव करूं म्हणती आपण ॥ तरी तें नरकासी कारण ॥ होईल निश्र्चयें जाण पां ॥३०॥

अघटित घडवी रघुनंदन ॥ स्तंभाविण राहिलें गगन ॥ उदकावरी पृथ्वी संपूर्ण ॥ न बुडे सहसाही ॥३१॥

त्याचें कर्तृत्व करिती इतर ॥ तरी अनर्थासी नाहीं पार ॥ स्वेच्छा वर्ते सर्वेश्र्वर ॥ नव्हे म्हणे कोण त्यातें ॥३२॥

यावरी उत्तरक्रिया समस्त ॥ वाळीची करी सूर्यसुत ॥ अंगदावरी रघुनाथ ॥ प्रीति अत्यंत करीत पैं ॥३३॥

असो ते तारा सुंदरी ॥ रामें बोधिली ऐशियापरी ॥ सुग्रीवासी दिधली निर्धारीं ॥ शेसपाट भरोनियां ॥३४॥

यावरी तारेनें माळ ॥ सुग्रीवासी घातली तात्काळ ॥ जेणें प्रसन्न होय तमालनीळ ॥ आचरण तेंचि उत्तम ॥३५॥

सकल कपि जयजयकारें ॥ गर्जना करिती लहान थोरें ॥ नभ नादावलें भुभुःकारें ॥ महागजरें दुमदुमत ॥३६॥

राघव म्हणे सुग्रीवास ॥ आम्ही येथें राहिलों चार मास ॥ तुम्ही भोगोनि राज्यविलास ॥ सत्वर परतोनि येइंजे ॥३७॥

अर्कज म्हणे रघुनाथा ॥ आपण किष्किंधेसी चलावे आतां ॥ श्रीराम म्हणे माझिया भरता ॥ कारणें मी व्रतस्थ ॥३८॥

माझिया जिवालागाविण ॥ न करी मी मंगळस्नान ॥ आठवोनि भरताचे गुण ॥ रघुनंदन गहिंवरला ॥३९॥

मी चित्रकूटींहूनि निघतां ॥ भरतासि जाहली जे अवस्था ॥ ते सुग्रीवा नये सांगतां ॥ धीर चित्ता न धरवे ॥४०॥

जैसें बाळक परदेशीं ॥ माता टाकोनि जाय तयासी ॥ मजविणें माझ्या भरतासी ॥ तैसें जाहलें असेल ॥४१॥

सांगतां भरताचे गुण ॥ सद्रद जाहला रघुनंदन ॥ सुग्रीव धांवोनि धरी चरण ॥ लक्ष्मणही गहिंवरला ॥४२॥

असो याउपरी राजीवनेत्र ॥ बोलतां जाहला नीरदगात्र ॥ म्हणे सुग्रीवावरी धरीं छत्र । सौमित्रा सत्वर जाऊनियां ॥४३॥

रघुपतीचे चरणांबुज ॥ वंदी तेव्हां सुमित्रातनुज ॥ आशीर्वाद देत भरताग्रज ॥ विजयी होई सर्वदा ॥४४॥

मग सौमित्रें जावोनि सत्वर ॥ सुग्रीवावरी धरिलें छत्र ॥ अमात्यपद पवित्र ॥ वाळीपुत्रासी दीधलें ॥४५॥

सवेंच परतोन लक्ष्मण ॥ आला जेथें जानकीजीवन ॥ जवळी उभा वायुनंदन ॥ कर जोडोनि सर्वदा ॥४६॥

किष्किंधेसी नित्य जाऊन ॥ राघवापाशीं येईं परतोन ॥ तों चातुर्मास लोटले पूर्ण ॥ सुग्रीवासी स्मरण नव्हेचि ॥४७॥

देखोनियां शरत्काळ ॥ बोलता झाला तमालनीळ ॥ म्हणे सुग्रीव जाहला सबळ ॥ राज्यमदेंकरूनियां ॥४८॥

विषयसंगें रमलें मन ॥ धनविद्यामदें गेला भुलोन ॥ परी सज्जनीं त्यास दंडोन ॥ सन्मार्गातें लावावें ॥४९॥

तरी किष्किंधेसी जाईं लक्ष्मणा ॥ आठव देईं सूर्यनंदना ॥ तो जरी न मानी माझिया वचना ॥ तरी वधोनि त्यासी येईंजे ॥५०॥

तारा रुमा दोघी घेऊन ॥ नित्य करी मद्यपान ॥ जो न करी माझे स्मरण ॥ त्यास अवश्य दंडावें ॥५१॥

जो ब्राह्मण देखोनि उपहास करी ॥ संत भक्तांचा द्वेष धरी ॥ सद्रुवचन अव्हेरी ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५२॥

निंदी हरिहरांची चरित्रें ॥ अपमानी जो सत्पात्रें ॥ अपूज्य पूजी आदरें ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५३॥

कायावाचामनें ॥ ज्यासी परपीडा अगत्य करणें ॥ आणि वेदविरूध्द ज्यासी वर्तणें ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५४॥

ऐश्र्वर्यमदें जे मातले ॥ हिंसा करितां न कंटाळले ॥ धर्मपंथ ज्यांनीं मोडिले ॥ त्यांसी अवश्य दंडावें ॥५५॥

कमळा आणि चक्रपाणी ॥ भेटों इच्छिती धर्मसदनीं ॥ कार्पण्यलोभें विघडी दोनी ॥ त्यास अवश्य दंडावें ॥५६॥

यावरी वीरचूडामणी ॥ किष्किंधेसी जाईं ये क्षणीं ॥ तो जरी माझें वचन अवगणी ॥ तरी तेचि क्षणीं वधावा ॥५७॥

वाळी निर्दाळिला ज्या बाणें ॥ त्याच शरें त्याचा प्राण घेणें ॥ ऐसें ऐकतां लक्ष्मणें ॥ राघवचरण वंदिले ॥५८॥

धनुष्यासी चढवूनि गुण ॥ वेगें चालिला उर्मिलाजीवन ॥ किष्किंधेसमीप येऊन ॥ लाविला बाण चापासी ॥५९॥

तों इकडे सूचना मारुति ॥ जाणवीत सुग्रीवाप्रति ॥ म्हणे एकला वनीं रघुपति ॥ चला वेगीं दर्शना ॥६०॥

सीताशुद्धीस त्वरीत ॥ वानर धाडावे निश्र्चित ॥ तूं जाहलासि उन्मत्त विसरलासि स्वामिकायार्थ ॥ सूर्यसुत मग बोले ॥६१॥

जाहले धूर्णित लोचन ॥ बोले उदासीन वचन ॥ म्हणे वानरसेना मेळवून ॥ सिद्ध करा हळू हळू ॥६५॥

ऐसें बोलोनि सूर्यसुत ॥ राणीवसामाजीं प्रवेशत ॥ तों नगरद्वारीं उर्मिलानाथ ॥ येवोनि उभा ठाकला ॥६६॥

धनुष्यासि लाऊनि बाण ॥ क्षोभे जैसा प्रळयाग्न ॥ पळों लागले वानरगण ॥ येती शरण सुग्रीवा ॥६७॥

तेव्हां सुग्रीव गजबजिला ॥ म्हणे हनुमंता रक्षी मला ॥ येरु म्हणे सौमित्र कोपला ॥ तो नाटोपें कवणातें ॥६८॥

उभयदारांसमवेत ॥ शरण येत सूर्यसुत ॥ आणिक वानरभार समस्त ॥ सांगे हनुमंत समस्तां ॥६९॥

म्हणे हो नम्रता धरून ॥ अवघे घाल लोटांगण ॥ तैसेंच करिती वानरगण ॥ सुग्रीवासहित तेधवां ॥७०॥

तारा रुमा पुढें होऊन सौमित्रास मागती चुडेदान ॥ सुग्रीव धरी दृढ चरण ॥ ऊर्मिलापतीचे तेधवां ॥७१॥

सौमित्र म्हणे क्रोधायमान ॥ ऐसे तुम्ही निर्दय पूर्ण ॥ श्रीरामसच्चिदानंदघन ॥ वनीं सोडोनि राज्य करितां ॥७२॥

तो अनंत ब्रह्मांडनायक ॥ अयोध्यानाथ पुण्यश्र्लोक ॥ त्यास वनीं सांडोनि राज्यसुख ॥ गोड कैसें वाटलें ॥७३॥

हनुमंत बोले वचन ॥ सर्व अपराध क्षमा करून ॥ उठवावा सूर्यनंदन ॥ प्रीती करोन येसमयीं ॥७४॥

मग उठवोनि सूर्यसुत ॥ राघवानुज आलिंगित ॥ तंव वानरभार अद्भुत ॥ चहूंकडोन धांविन्नले ॥७५॥

वानरचमूसमवेत ॥ चालिला तेव्हां तमारिसुत ॥ जैसी नदी उचंबळोन बहुत ॥ मिळूं जाय जलार्णवा ॥७६॥

आवेशें वानरगण धांवत ॥ जैसें गोकुळ तृषाक्रांत ॥ सरितापंथें जलपानार्थ ॥ चपळत्वेंकरून लोटती ॥७७॥

कीं दात्याचें गृह लक्षून ॥ धांवती वेगें याचकजन ॥ कीं पाहावया सद्रुरुचरण ॥ सच्छिष्य येती त्वरेनें ॥७८॥

कीं लग्नघडी उरली थोडी ॥ देखोनि धांवती वऱ्हाडी ॥ कीं मिलिंदचक्रें धांवती तांतडी ॥ पद्मकरंद सेवावया ॥७९॥

तैसे आले रघुपतीजवळी ॥ लोटांगणें घालिती सकळी ॥ रामें आलिंगिला हृदयकमळीं ॥ मित्रतनुज आदरें ॥८०॥

आणीकही सकळ वानरां ॥ भेटला परत्रींचा सोयरा ॥ कर जोडोनि पुढारां ॥ किष्किंधेश स्तवीतसे ॥८१॥

जय निगमागमवंद्या रघुवीरा ॥ भक्तकैवारिया आनंदसमुद्रा ॥ पंचकद्वययरथपुत्रा ॥ विश्र्वनेत्रा विश्र्वपाळा ॥८२॥

शरणागतासी तूं वज्रपंजर ॥ कदा नुपेक्षी शाङर्‌रधर ॥ जैसें सबळ काष्ठ तारी नीर ॥ आपण वाढविलें म्हणोनि ॥८३॥

तिळभरी पाषाण न तरे जळीं ॥ वृक्षा तारी सर्व काळीं ॥ शरणागतांची माउली ॥ तैसाचि तूं श्रीरामा ॥८४॥

पद्मासी ढका न लावी भ्रमर ॥ काष्ठें तात्काळ करी चूर ॥ तेंवि भक्तपाळक अभक्तसंहार ॥ सीतावल्लभा करिसी तूं ॥८५॥

असो भूरत्नशुद्धीसी वानर ॥ जावया इच्छिती सर्वत्र ॥ मग बोले विषकंठमित्र ॥ जाऊंद्या सत्वर चहूंकडे ॥८६॥

अर्कसुतें पाठवून दूत ॥ वानर आणिले समस्त ॥ अष्टदश पद्में बल अद्भुत ॥समरीं कृतांता जिंकिती ॥८७॥

सुग्रीवें घालोन आण ॥ आणिले वेगें सप्तद्वीपींचे हरिगण ॥ समस्तांसी म्हणे सूर्यनंदन ॥ ऐका वचन सत्य माझें ॥८८॥

सीताशुद्धि करून तत्वतां ॥ जानकी भेटवूं रघुनाथा ॥ हें कार्य सिद्धीस न पावतां ॥ निजनगरासी न जावें ॥८९॥

सीता न भेटवितां रघुवीरा ॥ जो कोणी जाईल माघारा ॥ तो मात्रागमनी अवधारा ॥ ब्रह्महत्यारी पापिष्ठ ॥९०॥

त्यासी रासभावरी बैसवून ॥ तात्काळ छेदीन नासिका कर्ण ॥ पृथ्वीवरी फिरवीन ॥ स्वामिद्रोही म्हणोनियां ॥९१॥

सीताशुद्धि नोहे म्हणोन ॥ जो कोणी येईल परतोन ॥ त्यासी मी स्वहस्तें दंडीन ॥ छेदीन कर चरण तयांचे ॥९२॥

तंव द्वीपद्वीपींचे वानर ॥ गिरिकंदरीं जे राहणार ॥ मेरुपाठारवासी समग्र ॥ देत भुभुःकार पातले ॥९३॥

नाद न मायेचि गगनीं ॥ चालतां दणाणी मंगळजननी ॥ शेष कूर्म दचकले मनीं ॥ भुभुःकारध्वनि ऐकोनियां ॥९४॥

एक हरि पर्वत उचलोनि ॥ कंदुकवत् धाडी गगनीं ॥ एक वरचेवर झेलोनि ॥ भिकावित दुसरीकडे ॥९५॥

एक महावृक्ष उपडोनि बळें ॥ झोडोनियां भक्षिती फळें ॥ पृथ्वी अंबर समग्र भरलें ॥ रीसवानरीं तेधवां ॥९६॥

एक गगनपंथें उडिया घेती ॥ खालीं पाडूं पाहती गभस्ती ॥ खुंटली समीराची गति ॥ वाट न फुटे चालावया ॥९७॥

एक पश्र्चिमसमुद्रा धांवती ॥ तों अस्तासी गेला दिनपति ॥ एक समुद्रीं पुच्छें बुडविती ॥ ओढून काढिती जलचरें ॥९८॥

दशलक्ष योनि उदकांत ॥ नाना जातींचे जीव बहुत ॥ आणोनि राघवासी दावित ॥ चतुःसमुद्र धुंडोनियां ॥९९॥

नानाजातींचे वानर ॥ बहुत रंग बहुत विकार ॥ एक उभे राघवासमोर ॥ वांकुल्या दाविती विनोदें ॥१००॥

अति विशाळ धरोनि द्रुम ॥ आनंदें नाचती प्लवंगम ॥ एक गायन करिती सप्रेम ॥ डुल्लती राम ऐकोनियां ॥१॥

राग उपराग भार्येसहित ॥ मूर्च्छना शरीर कंपित ॥ सप्त ताल अति संगीत ॥ गीत प्रबंध खंडरचना ॥२॥

गद्यपद्यछंदगति ॥ ऐकतां तटस्थ होय गभस्ति ॥ ठायींच्या ठायीं विरती ॥ गायन ऐकतां तयांचें ॥३॥

असो यावरी मित्रपुत्र ॥ मित्रकुठमंडणातें समग्र ॥ दावीतसे सकळ भार ॥ पृथ्वी अंबर भरलें तें ॥४॥

जैसे कां जलतरंग ॥ सागरीं तळपती सवेग ॥ परि तो पाहतांचि सांग ॥ सागरचि एकला ॥५॥

तैसा ब्रह्मानंद सागर रघुवीर ॥ तेथींच्या लहरी ते वानर ॥ असो पृथ्वी दिशा अंबर ॥ वानरमय दिसतसे ॥६॥

ते रघुनाथाची मनोवृत्ति ॥ सकळ सुर अवतरले क्षितीं ॥ वानवेषें अपार शक्ति ॥ उचलूं भाविती भूगोल ॥७॥

नळ केला दळाधीश ॥ अठरा पद्में वानर विशेष ॥ बहात्तर कोटी रीस ॥ छप्पन्न कोटी गोलांगूळ ॥८॥

सीतावल्लभ म्हणे किष्किंधानाथा ॥ मज वाटते बहुत चिंता ॥ अन्न वस्त्रें या समस्तां ॥ कोठून आतां पुरवावीं ॥९॥

अर्कज म्हणे जनकजावरा ॥ यांसी फळ मूळ कंद आहारा ॥ न मिळे तरी भक्षिती समीरा ॥ तेणेंचि तृप्त होती हे ॥११०॥

अंबर तरी हे दिगंबर ॥ शस्त्रें पर्वत किंवा तरुवर ॥ ऐकतां मंगळभगिनीचा वर ॥ परम आश्र्चर्य मानित ॥११॥

सुग्रीव म्हणे राजीवनेत्रा ॥ हा खेळ तुझा कोमलगात्रा ॥ जाणोनि पुससी विचारा ॥ पदवी वानरां देऊनियां ॥१२॥

असो यावरी ताराकांत ॥ सकळ वानरां आज्ञापित ॥ त्रिभुवन धुंडोनि समस्त ॥ सीताशुद्धि करावी ॥१३॥

महीतळ अतळ वितळ ॥ सुतळ तळातळ महातळ ॥ सातवें तें रसातळ ॥ शोधावया धाडिले ॥१४॥

विलोकावे चतुर्दश लोक ॥ वैकुंठकैलासादि सकळिक ॥ धुंडोनियां आवश्यक ॥ सीताशोध करावा ॥१५॥

कैलासादि ब्रह्मलोक ॥ इंद्रचंद्रसूर्यलोक ॥ जनलोक तपोलोक ॥ सकळ शोधूं धाडिले ॥१६॥

वरुणलोक भूलोक ॥ यमलोक पितृलोक ॥ मृत्युलोकासी विशेष देख ॥ लोक चतुर्दश धुंडावे ॥१७॥

भरतखंड रमणकखंड ॥ हरित सत्य विधिविशेष प्रचंड ॥ केतु सुवर्ण द्राक्ष वितंड ॥ हरिखंड नववें पैं ॥१८॥

जंबुद्वीप शाकद्वीप ॥ शाल्मली क्रौंच द्राक्षाद्वीप ॥ अंग वंगादि दक्षद्वीप ॥ छप्पन्न देश शोधिले ॥१९॥

वनें उपवनें पर्वत ॥ ऋषिआश्रम विवरें मठ बहुत ॥ भक्तांची स्थानें बहुत ॥ शोधावया धाडिले ॥१२०॥

तीर्थें क्षेत्रें शोधिलीं नाना ॥ परी रामांगना कोठें दिसेना ॥ सीतेचें स्वरूप समजेना ॥ कष्टती हे बहुसाल ॥२१॥

सीता रामाची ज्ञानशक्ति ॥ तिची कैसी आह स्थिती ॥ न पुसतां व्यर्थचि भ्रमती ॥ अहंमती भुलोनियां ॥२२॥

सद्रुरूसी न रिघतां शरण ॥ कदापि नोहे आत्मज्ञान ॥ नवनीत मंथनावांचून ॥ हाता न चढे सर्वथा ॥२३॥

व्यर्थ हिंडतां भागले वानर ॥ दृष्टी न पडे सीता सुंदर ॥ परतोनि येती समग्र ॥ अधोवदन लज्जित ॥२४॥

मग तयांचें समाधान ॥ स्वयें करीत रघुनंदन ॥ दक्षिणादिशेसी कोण कोण ॥ गेले तेंचि ऐका हो ॥२५॥

मुख्य अंगद वाळिसुत ॥ नळ नीळ ऋषभ जांबुवंत ॥ पांचवा तो हनुमंत ॥ जो उमाकांत अवतरला ॥२६॥

आणिक एक शत वानरगण ॥ रघुपतीची आज्ञा घेऊन ॥ आक्रमिलें सकळीं गगन ॥ वायुवेगें करोनियां ॥२७॥

तंव तो कृतांतासी शिक्षा करणार ॥ महाराज जो रुद्रावतार ॥ अंगदासी म्हणे क्षण एक स्थिर ॥ तुम्हीं रहावें समस्तीं ॥२८॥

कांहीं आठवलें मानसीं ॥ पुसोन येतों रघुपतीसी ॥ ऐसें बोलोनि तयांसी ॥ वायुसुत परतला ॥२९॥

एकाएकीं येऊन ॥ दृढ धरिले रामचरण ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ जैसा सुपर्ण विष्णुजवळी ॥१३०॥

तो बोले मंजुळ उत्तरीं ॥ म्हणे भार्गवजिता अवधारीं ॥ सीताशुद्धि वानरीं ॥ कैशी करावी तें सांगा ॥३१॥

सीतेचें स्वरूप कैसें स्वामी ॥ केवीं ओळखिजे प्लवंगमीं ॥ रूपरेखा कैशी आम्हीं ॥ जाणावी ती राघवा ॥३२॥

ऐसे हनुमंत बोलतां ॥ संतोषला कमलोद्भवपिता ॥ म्हणे तुझिया बुद्धीस तुळितां ॥ वाचस्पति हळुवट ॥३३॥

पुसिलें सीतास्वरूप ॥ तरी तें जाण माझेंचि रूप ॥ जैसी प्रभा आणि दीप ॥ एकरूप दोहींचें ॥३४॥

जैसी कनक आणि कांति ॥ कीं रजत आणि त्याची दीप्ति ॥ तैसी जाण सीता सती ॥ स्वरूप माझें अभेद ॥३५॥

सीतेच्या अंगींचा सुवास ॥ मृगमदाहूनि विशेष ॥ अर्धयोजन आसपास ॥ घ्राणदेवीसी संघटे ॥३६॥

खूण ऐकावी मारुति ॥ मुखीं कर्पूराची वसे दीप्ति ॥ माझें स्मरण अहोरातीं ॥ सीता सती करीतसे ॥३७॥

द्वादश हस्तप्रमाण साचार ॥ सीतेसमीप पाषाण तरुवर ॥ त्यांसी माझें स्मरण निरंतर ॥ खुण साचार ओळखें ॥३८॥

अंतरखूण सांग सीतेतें ॥ कैकयीगृहीं म्यां स्वहस्तें ॥ वल्कलें नेसविलीं तियेतें ॥ वनवासासी निघतां पैं ॥३९॥

मग विनवी समीरात्मज ॥ ऐसी खूण द्यावी मज ॥ जेणें अवनिजा मानी सहज ॥ दास मी तुमचा सत्य कीं ॥१४०॥

ऐकोनि मारुतीचें वचन ॥ तोषलें रघुनाथाचें मन ॥ धन्य धन्य म्हणवून ॥ शब्दरत्नें गौरविला ॥४१॥

धन्य तो अंजनी सज्ञान ॥ ऐसें प्रसवली निधान ॥ ज्याच्या प्रतापाखालीं संपूर्ण ॥ ब्रह्मांड ठेंगणें होय कीं ॥४२॥

प्रेम नावरे रघुनाथा ॥ हृदयीं आलिंगिलें हनुमंता ॥ वरदहस्त ठेवोन माथां ॥ करीं मुद्रिका घातली ॥४३॥

खूण दिघल अवतारमुद्रिका ॥ जेणें मानी जनककन्यका ॥ मग साष्टांगें रघुनायका ॥ हनुमंत वंदी ते काळीं ॥४४॥

पुढती विलोकी रामवदन ॥ हृदयीं रेंखिलें तैसेंचि ध्यान ॥ श्रीराम सद्रद होऊन ॥ बोलता जाहला ते काळीं ॥४५॥

कधीं येशील परतोन ॥ मग म्हणे वायुनंदन ॥ एक मास सरतां पूर्ण ॥ सीतादर्शन घेऊनि येतों ॥४६॥

ऐसें बोलून हनुमंत ॥ यशस्वी पूर्ण अयोध्यानाथ ॥ आनंदें गर्जोनि अकस्मात ॥ गगनपंथें उडाला ॥४७॥

जैसा योगभ्रष्ट जन्म पावत ॥ मागुतीं स्वरूपीं ऐक्य होत ॥ तैसे कपि वाट पाहात ॥ वायुसुत आला तेथें ॥४८॥

रामस्मरणें अवघे गर्जती ॥ सपक्ष नग जैसे उडती ॥ तैसे निराळमार्गे सर्व जाती ॥ अगस्तिदिशा लक्षोनी ॥४९॥

चपळ पाणिद्वयचरण ॥ गगनीं झेंपावती हरिगण ॥ यशस्वी अयोध्याप्रभु म्हणोन ॥ वारंवार गर्जती ॥१५०॥

अंतरिक्षीं जाती कपिगण ॥ तों देखिलें शापदग्ध वन ॥ वानरांचीं किरणें अडखळून ॥ मुरकुंडी वळोन पडियेले ॥५१॥

मागुती उड्डाण घेऊं जाती ॥ समस्तांच्या आकर्षिल्या शक्ती ॥ एकाकडे एक पाहती ॥ तटस्थ मारुति जाहला ॥५२॥

ऐसें काय कारण व्हावयासी ॥ तरी तेथें पूर्वीं दंडक ऋषी ॥ महातापसी तेजोराशी ॥ पुत्र त्यासी एक होता ॥५३॥

अष्टादश वरुषांचा सुत ॥ वनीं क्रीडतां अकस्मात ॥ वनदेवता अद्भुत ॥ भयानक धांविन्नली ॥५४॥

तिनें भक्षिला ऋषिनंदन ॥ दंडक तें जाणोन ॥ शापिलें तेव्हां तें कानन ॥ महाक्रोधेंकरूनियां ॥५५॥

जो या वनीं संचरेल पाणी ॥ तो मरण पावेल तेचि क्षणीं ॥ कपी सावध रामस्मरणीं ॥ म्हणोनि प्राण वांचले ॥५६॥

असो तो दंडकाचा नंदन ॥ विशाळ ब्रह्मराक्षस होऊन ॥ नित्य भक्षी जीव मारून ॥ द्वादशयोजनें भोंवते ॥५७॥

तेणें देखोन वानर ॥ मुख पसरोनि भयंकर ॥ भक्षावया आला सत्वर ॥ कपिवीर गजबजिले ॥५८॥

ऐसें देखोन वालिकुमर ॥ परमप्रतापी प्रचंडवीर ॥ निःशंक धांवोनि सत्वर ॥ राक्षस चरणीं धरियेला ॥५९॥

गगनीं गरगरां भोवंडिला ॥ उर्वीवरी आपटिला ॥ शरीर चूर जाहलें ते वेळां ॥ मृन्मयघटशकलासारिखें ॥१६०॥

ऐसा तो दंडकाचा पुत्र ॥ पावला तात्काळ पूर्वशरीर ॥ मग तेणें आपुला समाचार ॥ वानरांसी सांगितला ॥६१॥

वंदोनियां वानरगणा ॥ तात्काळ गेला पितृदर्शना ॥ पुढें रामदूतां पंथ सुचेना ॥ दिशा समजेना कोणती ॥६२॥

वृक्ष फळ ना जळ ॥ दग्ध वन दिसे सकळ ॥ क्षुधेतृषेनें सकळ ॥ वानर तेव्हां चडफडती ॥६३॥

ओंढवलें परम कठिण ॥ शोधिती शुष्क विपिन ॥ तंव एका विवरांतून ॥ पक्षीफळें आणिती ॥६४॥

त्या विवरद्वारीं येऊन ॥ थोकले तेव्हां वानरगण ॥ एक योजन लंबायमान ॥ तमेंकरून पूर्ण तें ॥६५॥

पुढें जाहला वायुकुमर ॥ मागें येती समस्त वानर ॥ जैसी संतांची कांस मुमुक्षु नर ॥ धरिती आत्मसाधनासी ॥६६॥

कीं वेदाध्ययनेंकरून ॥ वर्तती जैसे विद्वज्जन ॥ कीं खड्रधारें तीर्थस्नान ॥ करूनि स्वर्गस्थ होती तैसे ॥६७॥

हनुमंताच्या आधारें समस्त ॥ तैसे वानर विराजत ॥ परी कासाविस जाहले तेथ ॥ मूर्च्छा येऊनि पडती पै ॥६८॥

श्वासोच्छ्वास कोंडोन ॥ आकर्षिले सर्वांचे प्राण ॥ मग हनुमंतें पुच्छेंकरून ॥ सकळ बांधोन उचलिले ॥६९॥

योजन एक क्रमोनि विवर ॥ मारुति गेला सत्वर ॥ पुढें प्रकाश देखिला अपार ॥ वन सुंदर सफळ तें ॥१७०॥

पुष्पफळभारें द्रुम ॥ वाढिन्नले भेदीत व्योम ॥ त्या वृक्षांवरी प्लंगम ॥ चढावया शकती ना ॥७१॥

शरीर जाहले परम क्षीण ॥ यालागीं ऊर्ध्व न होती किरण ॥ तों सुप्रभा खेचरी येऊन ॥ उभी ठाकली तेधवां ॥७२॥

तियेप्रति पुसे वायुनंदन ॥ हेममय नगर पूर्ण ॥ फळोदक अमृतासमान ॥ कवणें हें स्थान निर्मिलें ॥७३॥

सुप्रभा सांगे पूर्ववृत्तांत ॥ ये स्थळीं होता मय दैत्य ॥ तेणें करून अद्भुत ॥ विष्णुसुत प्रसन्न केला ॥७४॥

त्याकारणें हें स्थान ॥ विरिंचीनें निर्मिलें येऊन ॥ त्यासी दिधलें वरदान ॥ विवरामाजी चिरंजीव तूं ॥७५॥

विवराबाहेर येतां जाण ॥ तात्काळचि पावसी मरण ॥ तो नानाकौटिल्यविंदान ॥ मंत्रहवन जाणतसे ॥७६॥

बहुत तप आचरोन ॥ दैत्यांचें इच्छी कल्याण ॥ मग इंद्रें विधीस प्रार्थून ॥ हेमा नारी निर्मिली ॥७७॥

स्वरूपें लावण्यें आगळी ॥ त्या विवरांत प्रवेशली ॥ मयदैत्यें देखिली ते वेळीं ॥ देखोनि तियेसी भूलला ॥७८॥

म्हणे मज तू वरी वो सुंदरी ॥ ते म्हणे चाल विवराबाहेरी ॥ मरण विसरोन दुराचारी ॥ उर्वीवरी पातला ॥७९॥

तों इंद्रें घालोनि वज्रप्रहार ॥ तेथेंचि मारिला मयासुर ॥ मग हेमेलागीं नगर ॥ ब्रह्मदेवें दिधलें ॥१८०॥

मग कित्येक काळ क्रमोनि देखा ॥ हेमा गेली सत्यलोका ॥ मी तिची परिचारिका ॥ वननगर रक्षीतसें ॥८१॥

देवां दुर्गम हें स्थान ॥ मज हेमा बोलिली वचन ॥ येथें येतील वानरगण ॥ तुज उद्धरोनि जाती ते ॥८२॥

हनुमंत सांगे पूर्ववृत्तांत ॥ सीताशुद्धीसी जातों समस्त ॥ क्षुधाक्रांत तृषाक्रांत ॥ या विवरांत प्रवेशलों ॥८३॥

मग तिनें घातला नमस्कार ॥ फळें पुष्पें आणोनि सत्वर ॥ वानरांसहित वायुकुमर ॥ षोडशोपचारीं पूजिला ॥८४॥

फळें उदक सेवून ॥ तृप्त जाहले वानरगण ॥ मग परतले तेथून ॥ परी विवरद्वार न सांपडे ॥८५॥

मग सुप्रभेसी म्हणे हनुमंत ॥ माते आम्हां दावीं शुद्ध पंथ ॥ तेव्हां ते खेचरी बोलत ॥ नेत्र समस्त झांका तुम्ही ॥८६॥

ऐसें ऐकतांचि वचन ॥ समस्तीं विवरीं झांकिले नयन ॥ सुमुहूर्ती एक मंत्र जपोन ॥ काय तेव्हां बोलिली ॥८७॥

मग म्हणे उघडा नेत्र ॥ तों समुद्रतीरीं उभे वानर ॥ सुप्रभा न दिसे साचार ॥ नवल थोर वर्तलें ॥८८॥

कपी आश्र्चर्य करिती ते क्षणीं ॥ जैसे संसारदुःखें वेष्टिले प्राणी ॥ त्यांसी निजज्ञान उपदेशूनि ॥ सद्रुरु काढी बाहेर ॥८९॥

कीं जळते घरींहून काढिलें ॥ कीं पूरीं बुडतां वांचविलें ॥ कीं शिर छेदितां सोडविलें ॥ तैसें केलें सुप्रभेनें ॥१९०॥

कृपाळु तो रविकुळभूषण ॥ तेणेंच ते दीधली धाडोन ॥ समुद्रतीरीं वानरगण ॥ ब्रह्मानंदें नाचती ॥९१॥

इकडे तें विवर त्यजूनि सुप्रभा ॥ किष्किंधेसी जाऊन सीतावल्लभा ॥ भेटली कौसल्यागर्भा ॥ दृष्टीभरोन न्याहाळित ॥९२॥

म्हणे ब्रह्मानंदा आत्मयारामा ॥ मज पावन करीं मेघश्यामा ॥ तीस ज्ञान सांगोन वदरिकाश्रमा ॥ राघवेंद्रें पाठविली ॥९३॥

काळांतरें बदरिकाश्रमीं ॥ देह ठेवोनि कैवल्यधामीं ॥ जैसा आर्द्रघट मिळे भूमीं ॥ तैसीच स्वरूपीं समरसली ॥९४॥

इकडे समुद्रतीरीं वानर ॥ चिंताक्रांत करिती विचार ॥ म्हणती शुद्धि न लागे अणुमात्र ॥ कैसा प्रकार करावा ॥९५॥

एक म्हणती परतोनि जावें ॥ काय रघुवीरांते सांगावें ॥ आमुचेनि हें कदा नोहे ॥ सीताशुद्धि म्हणोनियां ॥९६॥

तरी आतां द्यावे जी प्राण ॥ परी न जावें परतोन ॥ व्यर्थ वांचोन ॥ प्रेतवत संसारीं ॥९७॥

मग आणोन काष्ठभार ॥ ढीग रचिले पर्वताकार ॥ तात्काळचि वैश्र्वानर ॥ वानरवीरीं चेतविला ॥९८॥

तों जांबुवंत बोले वचन ॥ मीच आधीं सेवीन कृशान ॥ यावरी अंजनीगर्भरत्न ॥ ऋृक्षपतीप्रती बोले ॥९९॥

म्हणे जांबुवंता सर्वज्ञा ॥ मजप्रती द्यावी आधीं आज्ञा ॥ यावरी तो ऋृक्षराणा ॥ प्रत्युत्तर देतसे ॥२००॥

मी बहु वडील तुम्हांहून ॥ मज आधीं देइंजे हा मान ॥ मग बोले वायुनंदन ॥वडील आयुष्यें मी असे ॥१॥

जयाचे गांठीं आयुष्य फार ॥ तोचि वृद्ध म्हणावा साचार ॥ ज्याचें मरण जवळी निर्धार ॥ तोच धाकुटा बोलिजे ॥२॥

तुझें आयुष्य मागें सरलें ॥ माझें बहुत पुढें उरलें ॥ ज्याचे गांठीचें धन वेंचलें ॥ तरी भाग्यवंत नव्हे तो ॥३॥

असो मग जांबुवंताप्रती ॥ समस्त वानर विनविती ॥ श्रीराममुद्रांकित मारुति ॥ त्यासी आज्ञा देइंजे ॥४॥

मग हनुमंतें झांकून नेत्र ॥ हृदयीं आठविला कामांतकमित्र ॥ जो जीमूतवर्ण कोमलगात्र ॥ अति पवित्र नाम ज्याचें ॥५॥

स्मरण करूनि हनुमंत ॥ लोटला तेव्हां अग्निआंत ॥ उडीसरसा अग्नि शांत ॥ परम अद्भुत वर्तलें ॥६॥

वानर म्हणती कच्चें जाहलें ॥ काष्ठढीग पुढती रचिले ॥ आकाश कवळिलें ज्वाळें ॥ दिशा धूमें दाटल्या ॥७॥

सपक्ष नग येत अकस्मात ॥ तैसा लोटला हनुमंत ॥ तात्काळ जाहला अग्नि शांत ॥ न दिसे किंचित कोठें पैं ॥८॥

ऐसेंच केले तीन वेळ ॥ परी न मरे अंजनीबाळ ॥ आश्र्चर्य करिती कपी सकळ ॥ वर्णिती बळ मारुतीचें ॥९॥

कपी म्हणती हनुमंता ॥ आम्हांसी मरो दे तरी आतां ॥ येरू म्हणे सागरीं तत्वतां ॥ प्राण देऊं चला हो ॥२१०॥

तेथोन निघाले वानर ॥ तों समीप देखिला सरितेश्र्वर ॥ चिंताक्रांत वायुकुमर ॥ ध्यानस्थ बैसला एकीकडे ॥११॥

वरकड ते वानरगण ॥ चिंतातुर करिती शयन ॥ तों संपाती मुख पसरून ॥ भक्षावया पातला ॥१२॥

अरुणपुत्र तो पक्षी थोर ॥ जटायूचा ज्येष्ठ सहोदर ॥ मुख पसरोनि भयंकर ॥ वानरांसी भेडसावी ॥१३॥

जवळ देखोनि संपाती ॥ कपी एकमेकांसी बोलती ॥ जटायूसारिखा निश्र्चितीं ॥ दिसतसे द्विजराज हा ॥१४॥

म्हणती अनायासेंकरून ॥ आम्हांसी आलें जवळी मरण ॥ मग आठवून रघुनंदन ॥ नामस्मरणें गर्जती ॥१५॥

ज्याचें नाम घेतां संकटीं ॥ निर्विघ्न होय सकळ सृष्टी ॥ अपाय ते उपाय शेवटीं ॥ दुःख तें सुख होय ॥१६॥

असो नामघोषें कपी गर्जती ॥ तों पक्ष फुटले सपातीप्रती ॥ तेणें लोटांगण घातले क्षितीं ॥ जयजयकारेंकरूनियां ॥१७॥

म्हणे धन्य धन्य तुम्ही वानर ॥ केला माझा आजि उद्धार ॥ कोठें आहे रघुवीर ॥ माझा सहोदर तेथें असे ॥१८॥

बहुत दिवस जाहले ॥ परी त्याचा समाचार न कळे ॥ तों कपिवर बोलिले ॥ जटायु मारिला रावणें ॥१९॥

पितृव्य म्हणोनि रघुनाथ ॥ जटायूसी होता मानित ॥ त्याची उत्तरक्रिया समस्त ॥ राघवें केली निजांगें ॥२२०॥

जटायूचें सार्थक केलें ॥ संपातीनें आंग धरणीवरी टाकिलें ॥ म्हणे अहा ओखटें जाहलें ॥ दिशा शून्य बंधूविणें ॥२१॥

सूर्यमंडळ पहावयालागोनि ॥ दोघे गेलों होतो उडोनि ॥ तैं म्यां पक्षांखाली घालूनि ॥ जिवलग आपुला वांचविला ॥२२॥

माझे पक्ष दग्ध जाहले ते वेळीं ॥ मग म्यां भयें हांक फोडिली ॥ सूर्यरथीं अरुणें ऐकिली ॥ स्नेहेंकरूनि कळवळला ॥२३॥

मग सूर्यासी प्रार्थून ॥ वर दिधला मजलागून ॥ रामदूतांचें होतां दर्शन ॥ पक्ष संपूर्ण फुटतील ॥२४॥

जैसा पक्षहीन पर्वत ॥ तैसा पडिलों होतों येथ ॥ आजि पक्ष आले अकस्मात ॥ तुमच्या प्रतापें करूनियां ॥२५॥

हा चंद्रगिरि पर्वत ॥ ऐथें चंद्रनामा आहे महंत ॥ तो सद्रुरु माझा यथार्थ ॥ मज वेदांतज्ञान सांगे ॥२६॥

असो संपाती पुसे वानरातें ॥ कोठें जातां येणें पंथें ॥ कपी म्हणती सीताशुद्धीतें ॥ करूं जातों पक्षींद्रा ॥२७॥

संपाती मग बोलत ॥ पैल ते लंका दिसत ॥ सीता सती अशोकवनांत ॥ बैसली असे ध्यानस्थ ॥२८॥

तरी तुम्हीं समस्त वानरीं ॥ बैसावें माझिये पृष्ठीवरी ॥ नेऊन घालीन पैलपारीं ॥ लंकेमाजी येधवां ॥२९॥

अथवा एकोत्तरशत माझे सुत ॥ पृथक् पृथक् बैसा समस्त ॥ मग म्हणे जांबुवंत ॥ मार्गचि सांग आम्हांतें ॥२३०॥

संपाती बोले वचन ॥ ऐलतीरीं मलयागिरिचंदन ॥ त्याची शाखा शतयोजन ॥ लंकेमाजी प्रवेशली ॥३१॥

परी तेथें कृष्णसर्प असती ॥ तेथें तुमची न चले गती ॥ शतयोजन सरितापती ॥ लंकेसी परिघ आडवा ॥३२॥

नमस्कार करोनि वानरांसी ॥ संपाती गेला निजाश्रमासी ॥ मग कपी बैसले विचारासी ॥ जांबुवंतासहित पैं ॥३३॥

सागराचें जीवन ॥ रुंद असे शतयोजन ॥ उडावया सामर्थ्य पूर्ण ॥ कोणा किती सांगा तें ॥३४॥

परस्परें ते वानर ॥ करिती उडावयाचा विचार ॥ शतयोजनें समुद्र ॥ उडवे कोणासी एकदां ॥३५॥

जांबुवंत म्हणे मी जाईन ॥ परी भागले माझे चरण ॥ मी आणि वैद्य सुषेण ॥ दोघेजण श्रमलों बहु ॥३६॥

बळीचिये अद्भुत ॥ त्रिविक्रम जाहला वैकुंठनाथ ॥ सात प्रदक्षिणा एके दिवसांत ॥ केल्या आम्ही साक्षेपें ॥३७॥

तेणें भागले बहुत चरण ॥ त्याहीवरी वृद्धपण ॥ आणिक एकदां मेरूवरून ॥ उडी घातली म्यां तळवटीं ॥३८॥

तेव्हां सूर्यरथींचें चक्र ॥ मांडीस झगटलें जेवीं वज्र ॥ तेणें व्यथा अहोरात्र ॥ वृद्धपणीं जाचीतसे ॥३९॥

याकरितां नवजाय उड्डाण ॥ मग बोले वालिनंदन ॥ मी तेथें जाईन उडोन ॥ परी बाळ नेणतें ॥२४०॥

वानर म्हणती करावें काय ॥ या पैलतीरा कोण जाय ॥ जांबुवंत म्हणे वायुतनय ॥ याचे पाय धरा आतां ॥४१॥

तंव तो अंजनीचा नंदन ॥ करीत बैसला रामध्यान ॥ वानर घालिती लोटांगण ॥ करिती स्तवन मारुतीचें ॥४२॥

वानर म्हणती हनुमंतासी ॥ तूं सांग सखया किती उडसी ॥ हंसें आलें मारुतीसी ॥ काय तयांसी बोलिला ॥४३॥

अंजनी जैं मज प्रसवली ॥ बाळभूक बहु लागली । तैं लक्ष योजनें उडी घातली ॥ गभस्तीवरी अकस्मात ॥४४॥

ऐसें वचन ऐकिलें ॥ वानर चरणीं लागले ॥ राघवें बळ संपूर्ण ओळखिलें ॥ तरीच मुद्रा दीधली ॥४५॥

तरी आपुलें कार्य आतां ॥ सत्वर साधीं हनुमंता ॥ ऐसें म्हणतां कपिनाथा ॥ स्फुरण आलें ते काळीं ॥४६॥

हनुमंत म्हणे वानरासी ॥ तुम्हीं पर्वत धरा पोटेंसी ॥ माझिया अंगवातें घंघाटेंसीं ॥ समुद्रांत पडाल कीं ॥४७॥

झाडें खोडें वानर कवळित ॥ महेंद्रपर्वतीं चढे हनुमंत ॥ जांबुवंतादि वानर समस्त ॥ कौतुक पाहती मारुतीचें ॥४८॥

अघवे जे कां वानर ॥ त्यांसी पुसोन वायुकुमर ॥ आधीं पुच्छाचा फडत्कार ॥ गाजविला हनुमंतें ॥४९॥

हृदयीं केलें रामस्मरण ॥ शक्तिदाता तूं म्हणोन ॥ अहंकर्ता भाव गाळून ॥ मन निमग्न रघुनाथीं ॥२५०॥

तो परात्पर राजहंस ॥ जो रविकुळदिनेश ॥ ब्रह्मानंद पुराणपुरुष ॥ हृदयीं आठविला मारुतीनें ॥५१॥

रामविजय ग्रंथ वरिष्ठ ॥ षड्रसान्नांचें भरलें ताट ॥ ज्यांसी श्रवणाची क्षुधा उत्कट ॥ ते जेवोत आदरें ॥५२॥

किष्किंधाकांड येथें संपलें ॥ पुढें सुंदरकांड आरंभिलें ॥ ग्रंथाचें पूर्वार्ध जाहलें ॥ उत्तरार्ध परिसा आतां ॥५३॥

ब्रह्मानंदा जानकीजीवना ॥ श्रीधरवरदा जगद्भूषणा ॥ अज अजिता अव्यय निर्गुणा ॥ अक्षय अभंग अव्यया ॥५४॥

स्वति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकीनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टादशाध्याय गोड हा ॥२५५॥

श्रीरामविजयअध्याय १९ वा

श्री गणेशाय नमः

अद्भुत रामकथेचा महिमा ॥ देऊं गोदावरीची उपमा ॥ स्नान करितां कर्मा अकर्मा ॥ पासोनि मुक्त होइजे ॥१॥

उभयलोकीं इच्छा अधिक ॥ हींचि तटाकें सुरेख ॥ मनोरम प्रवाह देख ॥ उचंबळेल ब्रह्मानंदें ॥२॥

रामकथामृतजीवन ॥ प्रेमळ तेथें जळचरें पूर्ण ॥ देव गंधर्व मुनिजन ॥ तटीं सघन तरु हेचि ॥३॥

अनेक चरित्रें तत्वतां ॥ त्याचि येथें मिळाल्या सरिता ॥ भक्ति ज्ञान वैराग्य पाहतां ॥ ऊर्मी येथें विलसती ॥४॥

ओघ चालिला अद्भुत ॥ फोडोनियां पापपर्वत ॥ सप्तकांड सप्तमुखें मिळत ॥ भक्तहृदयसागरीं ॥५॥

जे त्रिविधतापें तापले ॥ जे तीर्थव्रतें करितां भागले ॥ ते येथें स्नान करितां निवाले ॥ नाहीं परतले संसारा ॥६॥

या गंगेत करिता स्नान ॥ अंगीं संचरे भक्तिज्ञान ॥ सकळ चातुर्ये एकवटोन ॥ पायां लागती अपार ॥७॥

सुंदरकांड इंद्रभुवन ॥ प्रेमरस तो सहस्रनयन ॥ वाग्देवी हे रंभा पूर्ण ॥ नृत्य करी कुशलत्वें ॥८॥

अंतरीं उघडोनि श्रवण ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ सप्तकांडोत्तर संपूर्ण ॥ सुंदरकांड रसभरित ॥९॥

अठरावे अध्यायीं कथा अद्भुत ॥ समुद्रतीरीं उभा हनुमंत ॥ लंकेसी जावया उद्युक्त ॥ वानर समस्त पाहती ॥१०॥

लोकप्राणेशसुत ते वेळां ॥ महेंद्राचळीं उभा ठाकला ॥ परम भुभुःकारें गर्जिन्नला ॥ तेणें डळमळिला भूगोल ॥११॥

सुटला जातां अंगवात ॥ म्हणोनि वानर भयभीत ॥ पोटासीं धरोनि पर्वत ॥ अगोदर बैसले ॥१२॥

यशस्वी रघुवीर म्हणोन ॥ समीरात्मजें केलें उड्डाण ॥ त्याचे अंगवातेंकरून ॥ प्रळय वर्तला सर्वांसी ॥१३॥

महातरुवर उन्मळोनि ॥ द्विजांऐसे फिरती गगनीं ॥ अचळ चळती ठायींहूनि ॥ भुभुःकारध्वनीसरसेचि ॥१४॥

नक्षत्रें रिचवती भूमंडळी ॥ बैसली मेघांची दांतखिळी ॥ कृतांतासंही ते वेळीं ॥ भय अत्यंत वाटलें ॥१५॥

उचंबळलें समुद्रजळ ॥ डळमळलें उर्वीमंडळ ॥ हेलावती सप्तपाताळ ॥ अंगवातेंकरूनियां ॥१६॥

भोगींद्र दचकला अंतरीं ॥ कूर्म निजपृष्ठी सांवरी ॥ यज्ञवराह धरित्री ॥ उचलोनि देत दाढेसी ॥१७॥

दिग्गज चळचळां कांपती ॥ मेरुमांदार डळमळिती ॥ सुधापानी परम चित्तीं ॥ भय पावले तेधवां ॥१८॥

शचीवर मनीं दचकला ॥ अपर्णा पडे शिवाचे गळां ॥ भयभीत जाहली कमळा ॥ विष्णु तीतें सांवरी ॥१९॥

विरिंचि सांगे सकळांप्रती ॥ सीताशुद्धीस जातो मारुती ॥ सुर विमानी बैसोनि येती ॥ अद्भुत कौतुक पहावया ॥२०॥

कौतुक विलोकिती सुर सकळ ॥ प्रतापरुद्र अंजनीबाळ ॥ कीं तो वासरमणि निर्मळ ॥ वानरवेषें जातसे ॥२१॥

कल्पांविजूचे उमाळे भडकती ॥ तैशी कुंडलें कर्णीं तळपती ॥ वज्रकौपीन निश्र्चितीं ॥ कटिप्रदेशीं मुंजी झळके ॥२२॥

त्रिगुणरूप कल्पांतचपळा ॥ तेवीं यज्ञोपवीत रुळे गळां ॥ उणें आणिलें दिव्य प्रवाळा ॥ मुखीं पृच्छाग्नीं रंगा तैसा ॥२३॥

अंगींच्या रोमावळी पिंजारत ॥ भुभुःकारें नभ गर्जत ॥ दिग्गजांची टोळीं बैसत ॥ आंदोळत ब्रह्मांड ॥२४॥

गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ प्रतिशब्द देत अंबर ॥ दणाणित लंकानगर ॥ दशवदन हडबडला ॥२५॥

चपळ पदद्वय आणि पाणी ॥ झेंपावत धांवे गगनीं ॥ उड्डाणावरी उड्डाण घेऊनि ॥ रुद्रावतार जातसे ॥२६॥

अंतरिक्षीं जाय सपक्ष पर्वत ॥ कीं क्षीराब्धीशायीप्रति द्विजेंद्र धांवत ॥ कीं मानस लक्षोनियां जात ॥ राजहंस ज्यापरी ॥२७॥

कीं चिंतामणिवारु सवेग ॥ चपळत्वें क्रमी नभमार्ग ॥ अंजनीहृदयारविंदभृंग ॥ जात चपळ तैसाचि ॥२८॥

पितयाचें बहुत गमन । तयाहूनि सवेग कपीचें उड्डाण ॥ किंवा रघुनाथाचा बाण ॥ चापापासून सुटला ॥२९॥

कीं मनाचें चंचळपण ॥ पावे जैसें चिंतिलें स्थान ॥ तैसा लोकप्राणेशनंदन ॥ यमदिशा लक्षोनि जातसे ॥३०॥

ऐसा अंतरिक्ष जातां हनुमंत ॥ आश्र्चर्य करिती देव समस्त ॥ म्हणती पाहों याचें सामर्थ्य ॥ रंभा त्वरित पाठविली ॥३१॥

साधितां परमार्थज्ञान ॥ आडवें येत मायाविघ्न ॥ कीं साधूं जातां निधान ॥ विवशी येत आडवी ॥३२॥

तैशी रंभा देवीं धाडली ॥ मुख पसरोनि उभी ठाकली ॥ तिच्या वदनांत उडी पडली ॥ हनुमंताची अकस्मात ॥३३॥

तिच्या कर्णद्वारें मारुति ॥ सवेंचि निघाला त्वरितगती ॥ तिणें हनुमंत स्तविला प्रीतीं ॥ स्वर्गाप्रति गेली मग ॥३४॥

समुद्रें पाठविला पर्वत ॥ मैनाकनामें अद्भुत ॥ तो ऊर्ध्वपंथें आडवा येत ॥ हनुमंतासी ते काळीं ॥३५॥

जों जों वाढे पर्वत ॥ तों तों उंच जाय हनुमंत ॥ मग तो अचळ प्रार्थित ॥ हनुमंतासी ते काळीं ॥३६॥

म्हणे महापुरुषा मजवरी ॥ विश्रांति घेईं क्षणभरी ॥ मग एकाच हस्तें भारी ॥ नग पाताळीं घातला ॥३७॥

जो शांतिसुखें डोलत ॥ त्यास देखोन क्रोध पळत ॥ तैसा हस्तभारें पर्वत ॥ सागरांत दडपिला ॥३८॥

तेथोन उड्डाण पुढें चालिलें ॥ तों सिंहिकेनें वदन पसरिलें ॥ छायासूत्र साधिलें ॥ कापट्य केलें अद्भुत ॥३९॥

राहूकेतूंची जे माता ॥ तेचि सिंहिका जाण तत्वतां ॥ ती ग्रासावया हनुमंता ॥ पूर्वींच तेथें जपत होती ॥४०॥

उताणी समुद्रांत निजोन ॥ बारा योजनें पसरिलें वदन ॥ छाया पडतांचि वायुनंदन ॥ तिच्या वदनांत कोसळला ॥४१॥

स्वर्गीचा हुडा अकस्मात ॥ उर्वीवरी जेवीं पडत ॥ सिंहिकेच्या वदनी हनुमंत ॥ पडिला सत्य त्यापरी ॥४२॥

ते दांतांसि दांत मेळवित ॥ तों उदरांत गेला हनुमंत ॥ पोट फाडून त्वरित ॥ आला बाहेर ते काळीं ॥४३॥

विषयपाश तोडोनि समस्त ॥ परमार्था निघे जेवीं विरक्त ॥ तैसा बाहेर आला हनुमंत ॥ सिंहिका तेथेंच निमाली ॥४४॥

पुढें चालिलें उड्डाण ॥ तों लंकादेवी आली धांवोन ॥ तिनं आडवा पाय घालून ॥ हनुमंतासी पाडिलें ॥४५॥

करितां श्रीरामभजन ॥ नसतीं विघ्नें येति धांवोन ॥ परी साधक तितकीं लोटून ॥ सावधान स्मरण करी ॥४६॥

असो लंकादेवीस मुष्टिप्रहार ॥ वज्रप्राय देत वायुकुमर ॥ तिणें स्तवन केलें अपार ॥ म्हणे मज न मारावें ॥४७॥

तूं विजयी होशील साचार ॥ तंव पुढें उडी जात अपार ॥ पडलंकेसी सत्वर ॥ उडी जावोन पडियेली ॥४८॥

उडी सरसी त वेळीं ॥ पडलंका ते दणाणिली ॥ क्रौंचा असे तये स्थळीं ॥ कनिष्ठ भगिनी रावणाची ॥४९॥

तिचा घर्घरनामें भ्रतार ॥ इंद्रें मारिला तो असुर ॥ यालागीं क्रौंचेसी दशकंधर ॥ पडलंकेसी स्थापित ॥५०॥

असो तें दणाणिलें लंकानगर ॥ म्हणोनि क्रौंचा घेत समाचार ॥ असुरी पाठविल्या अपार ॥ धरिला वानर ते काळीं ॥५१॥

तो हनुमंतें ते वेळे ॥ संकीर्ण रूप धरिलें कोवळें ॥ क्रौंचेनें डोळां देखिलें ॥ हातीं धरिलें दृढ तेव्हां ॥५२॥

म्हणे हा चिरा गे वानर ॥ पाक करोनि आणा सत्वर ॥ हनुमंत म्हणे माझें शरीर उदकमय सर्वही ॥५३॥

पाक करितां नुरेचि कांहीं ॥ यालागीं तूं सगळाचि खाईं ॥ असुरीनें उचलोन लवलाहीं ॥ मुखांत घातला हनुमंत ॥५४॥

दांतांसि दांत मिळवी येरी ॥ तंव तो प्रवेशला अंतरीं ॥ काळिज धरोनि उभय करीं ॥ झोळकंबा घेत मारुति ॥५५॥

तंव ते चडफडे ते वेळे ॥ भोवंडी तेव्हां नेत्रबुबुळें ॥ गडबडां भूमीवरी लोळे ॥ वांचवा म्हणे मज आतां ॥५६॥

सूकरविष्ठा आणोन बहुत ॥ असुरी क्रौंचेसी पाजित ॥ हनुमंत आंत कंटाळत ॥ निघो पाहत बाहेरी ॥५७॥

तिच्या नासिकद्वारे हनुमंत ॥ पुच्छाग्र बाहेर दावीत ॥ असुरी धरोनि वोढित ॥ रोगबीज म्हणोनियां ॥५८॥

ओढी ओढितां अपार ॥ पुच्छरोगाचे पडिले ढिगार ॥ मग हनुमंतें असुरी समग्र ॥ बांधोनियां आसुडिल्या ॥५९॥

हनुमंताचें अद्भुत बळ ॥ क्रौंचेचीं आंतडीं तोडिलीं सकळ ॥ उदर फोडोन तात्काळ ॥ बाहेर आला गर्जोनियां ॥६०॥

असंख्यात राक्षिसिणी ॥ भारा बांधोनि आपटिल्या धरणीं ॥ भिरकावित समुद्रजीवनीं ॥ जाहलीं पारणीं जळचरांचीं ॥६१॥

जैशा मनाच्या अनंत वृत्ती ॥ मनोजयें योगी आकर्षिती ॥ तैशा असुरी संहारूनि मारुति ॥ विजयी जाहला पडलंके ॥६२॥

अत्यंत वृद्धा असुरी ॥ उरल्या होत्या नगरांतरीं ॥ तयांसीं म्हणे रुद्रावतारी ॥ लंका कोणती दावा गे ॥६३॥

नाहीं तरी तुम्हांस भक्षीन ॥ म्हणेन पसरिलें तेव्हां वदन ॥ वृद्धा बोलती भिऊन ॥ पैल ते लंका दिसतसे ॥६४॥

तों अस्ता गेला दिनकर ॥ निकुंभिलेंत प्रवेशला वायुकुमर ॥ शोधित चालिला सीता सुंदर ॥ धांडोळित सर्वही ॥६५॥

केरामाजी पडले मुक्त ॥ तें झारा युक्तीनें निवडित ॥ कीं सारासारविचार शोधित ॥ साधक आत्मप्राप्तीतें ॥६६॥

कीं यात्रेंत चुकली जननी ॥ सत्पुत्र काढी शाधूनि ॥ कीं महावैद्य काननीं ॥ संजीविनी शोधूं निघे ॥६७॥

समुद्रांत नेले वेद ॥ ते मत्स्यरूपी शोधी मुकुंद ॥ तैसा राघवचरणब्जमिलिंद ॥ निकुंभिलेंत सीता शोधी ॥६८॥

तों देखिलें शक्रजिताचें मंदिर ॥ हेमरत्नअति सुंदर ॥ त्यांत प्रवेशला वानर ॥ राघवप्रिया पहावया ॥६९॥

शक्रजित सुलोचना उभयंता ॥ शेजे पहुडलीं होय देखता ॥ मग म्हणे हेच होईल सीता ॥ रत जाहली परपुरुषीं ॥७०॥

आतां घालोनि पाषाण ॥ घेईन दोघांचाही प्राण ॥ मग म्हणे ऐकावें भाषण ॥ बोलती काय परस्परें ॥७१॥

तंव ते शेषकन्या स्वभावें तेथ ॥ इंद्रजितासी बोलत ॥ तुमचा पिता लंकानाथ ॥ अनुचित वर्तत असे ॥७२॥

अणुमात्रही वैर नसतां ॥ व्यर्थ आणली जनकदुहिता ॥ कुळक्षयास तत्वतां ॥ कारण केलें गमताहे ॥७३॥

परसतीचा अभिलाष करी ॥ साधुसंतांचा द्वेष धरी ॥ गुरुद्रोह ज्यामाझारी ॥ अल्पयुषी तो साच ॥७४॥

मातापित्यांचा करी तिरस्कार ॥ ब्राह्मणांसी निंदी निरंतर ॥ जो हिंसक दुष्ट दुराचार ॥ अल्पायुषी तोचि पैं ॥७५॥

हरिचरित्रें उच्छेदित ॥ निंदी महापुरुषांचे ग्रंथ ॥ नसतेंच काढी पाखंड मत ॥ अल्पायुषी तो साच ॥७६॥

म्हणोनी श्रावणारितनयवनिता ॥ आणोनि अनर्थ केला वृथा ॥ आतां लंकेची गति तत्वतां ॥ न दिसे पाहतां बरी कांहीं ॥७७॥

ऐकतां ऐशी मात ॥ लंकेंत प्रवेशे हनुमंत ॥ बिभीषणाचे मंदिरांत ॥ वायुसुत संचरला ॥७८॥

सत्वशील बिभीषण ॥ करीत विष्णूचें उपासन ॥ सदा होत हरिकीर्तन ॥ तेणें सदन दुमदुमिलें ॥७९॥

नाहीं रजतमांची वार्ता ॥ न दिसे द्वेष हिंसा तत्वतां ॥ पुराणश्रवण हरिकथा ॥ याविण चर्चा नसेचि ॥८०॥

दया क्षमा आणि शांती ॥ बिभीषणाचे हृदयीं नांदती ॥ असो तेथें कीर्तनीं मारुति ॥ ब्रह्मानंदें नाचतसे ॥८१॥

कीर्तनकल्लोळ रंगांत ॥ गडबडां लोळे हनुमंत ॥ कंठ होऊनि सद्रदित ॥ ब्रह्मानंदें डुल्लतसे ॥८२॥

घेऊन भक्तांचें चरणरज ॥ कपाळीं लावी वायुतनुज ॥ म्हणे होय राक्षसवंशज ॥ परी भक्तराज सात्त्विक हा ॥८३॥

वायासांत कोकिळा वसत ॥ कीं दैत्यकुळी प्रल्हाद भक्त ॥ कीं कागविष्ठेंत अश्र्वत्थ ॥ तें वास्तव्य स्थळ विष्णूचें ॥८४॥

कीं परिस जैसा पाषाणांत ॥ कीं शुक्तीमाजीं दिव्य मुक्त ॥ तैसा राक्षसकुळीं हा भक्त ॥ अलंकृत उत्तम गुणीं ॥८५॥

लंकेस आलिया रघुनंदन ॥ सहपरिवारें मारूनि रावण ॥ मग रघुपतीस प्रार्थोन ॥ राज्य संपूर्ण देईन यासी ॥८६॥

जैसे दवडोन काम क्रोध ॥ साधु करिती निजबोध ॥ तैसा बिभीषण भक्त प्रसिद्ध ॥ अक्षय स्थापीन लंकेसी ॥८७॥

बिभीषणाचे मंदिरांत ॥ परम संतोषला हनुमंत ॥ जैसें तृषेनें पीडितां बहुत ॥ गंगा अकस्मात देखिली ॥८८॥

चकोरा पावे रोहिणीवर ॥ कीं चातकां वोळला अंबुधर ॥ तैसें देखोनि बिभीषणाचें मंदिर ॥ वायुपुत्र आनंदला ॥८९॥

मग चालिला पुढारां ॥ देखें कुंभकर्णाचे मंदिरा ॥ तों दुर्गंधि आली एकसरां ॥ कंटाळे मन मारुतीचें ॥९०॥

जैसा मेघ गडगडित ॥ तैसा कुंभकर्ण घोरत ॥ कुंजर म्हैसे खर बहुत ॥ नासिकाबिळांत गुंतले ॥९१॥

श्र्वासासरसे बाहेरी ॥ आरडत पडती एकसरी ॥ कीं तो मंदराचळ पृथ्वीवरी ॥ निद्रिस्त हावोन पडियेला ॥९२॥

मातेचिया उदरांतून ॥ जेव्हां पडला कुंभकर्ण ॥ तेव्हां पसरोनि विशाळ वदन ॥ तीस सहस्र स्त्रिया गिळियेल्या ॥९३॥

असो देखोन कुंभकर्ण ॥ आश्र्चर्य करी वायुनंदन ॥ म्हणे हा वृथा पुष्ट जन्मोन ॥ व्यर्थ येथें पडियेला ॥९४॥

देखोन अंत्यजाचें घर ॥ पळे जैसा श्रोत्रीय पवित्र ॥ तैसा अंजनीचा पुत्र ॥ सांडोन चालिला पुढारा ॥९५॥

जो कल्पद्रुमीं द्विज राहणार ॥ तो बाभुळेवरी न बैसे साचार ॥ तैसें अव्हेरूनि घटश्रोत्राचें घर ॥ रामकिंकर पुढें जाय ॥९६॥

कोठें नुमगे मंगळभगिनी ॥ मारुति विचार करी मनीं ॥ कोणतें स्वरूप धरूनि ॥ लंकेमाजीं हिंडावें ॥९७॥

वानररूपेंकरूनि ॥ जरी विचरावें लंकाभुवनीं ॥ तरी राक्षस विनोदें धरूनि ॥ नाना चेष्टा करितील ॥९८॥

राक्षसरूप धरावें क्रूर ॥ तरी करवितील मांसाहार ॥ द्विजमांस भक्षितां साचार ॥ पुण्य समग्र भस्म होय ॥९९॥

कीं करूं जाऊं शिष्टाई ॥ तरी रावण न मानी काळत्रयीं ॥ राक्षसांसी भेद करितां पाहीं ॥ विनोद माझा करितील ॥१००॥

असो वानररूप पालटोनी ॥ अणुप्रमाण वेष धरूनि ॥ न खुपे मुंगीचे नयनीं ॥ घरोघरीं हिंडतसे ॥१॥

जैसा जनीं असोनि जनार्दन ॥ जीवासि नव्हे दृश्यमान ॥ तैसा निरालोद्भवनंदन ॥ व्यक्त न दिसे कोणासी ॥२॥

घरोघरीं चर्या पहात ॥ तों अवघे देखिले अधर्मरत ॥ वरिवरि आचार दावित ॥ जैसा मैंद शांति धरी ॥३॥

घरोघरीं अग्निहोत्रें पूर्ण ॥ मुखीं सदा वेदाध्ययन ॥ परी दृष्टी देखतां गोब्राह्मण ॥ मुखीं घालोनि रगडिती ॥४॥

जारकर्मरत नारीनर ॥ रुद्राक्षमाळा घेऊन थोर ॥ जपती सदा कौटिल्यमंत्र ॥ जारण मारण मोहनादि ॥५॥

लटिकेचि डोळे झांकून ॥ दाविती शांति अवलंबून ॥ मांस रक्त मद्यपान ॥ घूर्णितनयन डुल्लती ॥६॥

हृदयीं मद मत्सर दुमदुमिती ॥ वाचाबळें जनांसी गोंविती ॥ आम्ही कर्मातीत जाहलों म्हणती ॥ सदाचारभ्रष्ट क्रिया ॥७॥

आम्ही ज्ञानी सदा मुक्त ॥ झालों लोककर्मविरहित ॥ मना आवडे तो भाग भोगित ॥ महा उन्मत्त विषयांध ॥८॥

व्यर्थ राक्षसांचा आचार ॥ जैसें स्नान करून आले कुंजर ॥ कीं भस्मांत लोळती खर ॥ त्यांसी योगीश्र्वर कोण म्हणे ॥९॥

एक राक्षस संन्यास घेऊन ॥ करिती गोमांसभक्षण ॥ सवेंच संपादोनी आचमन ॥ कर्ता कोण म्हणती पैं ॥११०॥

विरजाहोम करून ॥ तीळ तूप गेलें जळोन ॥ कामक्रोधादि साहीजण ॥ अधिकाधिक माजले ॥११॥

नाना जीवाजाती भक्षोनी ॥ म्हणती आम्हांतें शिवूं नका कोणी ॥ एक गोचर्म पांघरोनी ॥ जटाधारी बैसला ॥१२॥

वनांत हिंडती वानप्रस्थ ॥ गोहननालागीं बैसती गुप्त ॥ ब्राह्मणांसी मारून भक्षित ॥ कर्ता येथें कोण म्हणती ॥१३॥

आम्ही ब्रह्मचारी विरक्त ॥ म्हणोन इंद्रियें ठेविलीं मुक्त ॥ गृहस्थ पडले गृहागतींत । पापें अमित जोडिती ॥१४॥

क्षत्रिय अधर्म तेथें सर्व वसती ॥ समरीं पाठी देऊन पळती ॥ वाढिवेच्या गोष्टी बोलती ॥ घाय घालिती अधर्मे ॥१५॥

वैश्यांचें अधर्मी चित्त ॥ जोखोन दुसऱ्यासी नाडित ॥ शुद्ध धर्मवाट पाडित ॥ विप्रसेवा सांडोनियां ॥१६॥

वाण्यांनी उदीम तळासी आणिला ॥ सर्वत्रांचा गुंडाळा केला ॥ सोनारीं वरकोल घातला ॥ सर्व जिरविले अलंकार ॥१७॥

सोनार ठकठक करिती ॥ तेथें नाहीं सीता सती ॥ नाळी झांकणी कांसार विकती ॥ चिच्छक्ती तेथें कैंची ॥१८॥

व्यवहारें कालांतरीं प्राप्ति ॥ लक्षूनि परहस्तीं समर्पिती ॥ खत हातीं लिहून घेती ॥ पाहोन रडती जन्मवरी ॥१९॥

तेली भोंवे घाण्याभोंवता ॥ तेथें कैची सती सीता ॥ साळी कोष्टी पांजणी करितां ॥ जन्म वृथा पैं गेला ॥१२०॥

गारींत निघाले जीवें जीत ॥ तांबोळी शायशीं पंचायशीं ॥ करित ॥ शिंपी अखंड ते खंडित ॥ सीता निश्र्चित तेथें कैंची ॥२१॥

रंगारी जें वस्त्र श्र्वेत ॥ तें काळें करिती निश्र्चित ॥ नसतेचि ठसे लावित ॥ शुद्धावरी मूर्ख पैं ॥२२॥

भुसाऱ्यांनीं धान्यसंग्रह केला ॥ मोजितां व्यर्थ जन्म गेला ॥ तेथें नाहीं जनकबाळा ॥ ते चित्कळा अवतरली ॥२३॥

वेद पढती वेदपाठक ॥ तेथें निष्ठा न धरिती अभाविक ॥ प्रतिग्रहाखालीं जन्म देख ॥ गेला निश्र्चित तयांचा ॥२४॥

इदं भवति इदं न भवति ॥ पंडित हेंचि खटपटती ॥ सदा परनिंदा जल्पती ॥ सीता सती तेथें कैंची ॥२५॥

ताठले सदा गायक ॥ अभिमानानें हुंबती अधिक ॥ प्रेम सांडोनि गाती श़ृंगारिक ॥ सीता सती तेथें कैंची ॥२६॥

ज्यातिषी गोंविले ग्रहगतीं ॥ गृहांत पडिले ते न निघती ॥ आपण कोण हे नेणती ॥ सीता सती तेथें कैंची ॥२७॥

प्रहस्तादि प्रधान घरें ॥ शोधिलीं सर्व अंतःपुरें ॥ पद्मिणीसम स्वरूपें सुंदरें ॥ पदनखा भृंग रुणझुणती ॥२८॥

हनुमंत नाना तर्क करी ॥ कोठें नुमगे जनककुमरी ॥ म्हणे योगगतीनें निर्धारीं ॥ प्राण दिधला जानकीनें ॥२९॥

कीं सरितापतिमाजीं बुडाली ॥ कीं रावणें सक्रोधें भक्षिली ॥ अंतररिक्षांहून खालीं पडली ॥ गेली चूर होऊनियां ॥१३०॥

कीं रावणें दृढ धरिली ॥ कळ लागोन सुकुमार मेली ॥ कीं रावणपत्न्यांनीं मारिली ॥ सवतीमत्सर करोनियां ॥३१॥

हनुमंत दुःखें गडबडां लोळे ॥ आंसुवें पूर्ण भरले डोळे ॥ म्हणे वृथा समुद्रलंघन केलें ॥ शून्य पडिलें सर्व कार्य ॥३२॥

अहा सीते सीते करून ॥ वृथा आलिंगी राजीवनयन ॥ सीतेचें रूप म्हणोन ॥ हृदयीं पाषाण धरीतसे ॥३३॥

मी गेलिया रघुनाथ ॥ प्राण त्यागील यथार्थ ॥ सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ सुमित्रासुत न वांचती ॥३४॥

जाईल अयोध्येसी समाचार ॥ भक्त शिरोमणी भरत वीर ॥ शत्रुघ्न आणि माता समग्र ॥ प्राण देतील निर्धारें ॥३५॥

वृथा कष्ट गेले मुळींहूनि ॥ ठायी न पडे जनकनंदिनी ॥ नवजाय मी परतोनि ॥ चापपाणी वाट पाहील ॥३६॥

करितां रघुपतीचें स्मरण ॥ विघ्नें पळती मुळींहून ॥ जैसा सुटतां अद्भुत प्रभंजन ॥ जलदजाळ क्षणीं वितळे ॥३७॥

पडतां किंचित अग्न ॥ तृण पर्वतींचें जाय जळोन ॥ कीं गृहस्वामी जागा देखोन ॥ तस्कर जेवीं पळती पैं ॥३८॥

कीं उगवतां दिनपति ॥ भगणें सर्व लोपती ॥ मृगेंद्र देखितां निश्र्चितीं ॥ अचेतन होती वारण ॥३९॥

तैसें रघुपतीचें करितां स्मरण ॥ विघ्नें सर्व पळती उठोन ॥ करोनि लंकेचें कंदन ॥ पालथी घालीन सागरीं ॥१४०॥

ऐसें बोलोन हनुमंत ॥ कलह माजविला लंकेत ॥ घरोघरीं लोकांत आकांत ॥ ओढविला वायुसुतें ॥४१॥

रत्नजडित गोपुरें देखा । विद्युत्प्राय झळकती पताका ॥ कनक कळसां नाहीं संख्या ॥ दिव्य लंका नगर तें ॥४२॥

अंजनीसुत मत्त वारण ॥ पुच्छ हें वज्रशुंडा जाण ॥ सकळ गापुरें ओढून ॥ अकस्मात पाडित ॥४३॥

मध्यरात्र जाहली पूर्ण ॥ निद्रार्णवीं लोक निमग्न ॥ तों अकस्मात घरें कोसळून ॥ पडोनि जन दडपती ॥४४॥

जैसे पर्वताचे कडे खचती ॥ तैशीं गोपुरें खालीं पडती ॥ महाद्वारें ओढून मारुति ॥ झुगारित गगनपंथें ॥४५॥

गवाक्षद्वारें पुच्छ घालून ॥ गृहस्तंभ पाडी आकर्षून ॥ लत्ताप्रहारें करून ॥ कपाटें फोडोन टाकित ॥४६॥

नगरतळ दणाणत ॥ भयंकर घोषें किंकाटत ॥ वृक्ष उन्मळी अकस्मात ॥ भयभीत लोक जाहले ॥४७॥

एकचि नगरीं कोल्हाळ झाला ॥ एक म्हणती पळा रे पळा ॥ ऐसें बोलतां अकस्मात शिळा ॥ येऊन पडती मस्तकीं ॥४८॥

राक्षसिणींची बाळें धरुनि ॥ भिरकावून देत गगनीं ॥ राक्षसी वक्षःस्थळें बडवूनि हांका फोडिती आक्रोशें ॥४९॥

स्त्रीपुरुष दोघें नग्न ॥ एकांतीं केलें शयन ॥ तीं जागीं न होतां उचलून ॥ बिदीस शेज ठेवित ॥१५०॥

भांडारगृह फोडून ॥ नाना वस्तूंच्या मांदुसा आणून ॥ राजबिदीस टाकी पूर्ण ॥ एकेच ठायीं सर्वांच्या ॥५१॥

पुच्छाचे चपेटे थोर ॥ रात्रीं वाजवी वारंवार ॥ भयभीत जाहले अवघे असुर ॥ बोलों उत्तर न शकती ॥५२॥

ऐसें नगर गांजोनि पूर्ण ॥ मग राजद्वारावरी जाऊन ॥ बैसला अंजनीनंदन ॥ कलह पूर्ण माजवावया ॥५३॥

हृदयीं पुच्छ धरोनि हनुमंत ॥ वारंवार तया चुंबित ॥ डोळे मोडोन वांकुल्या दावित ॥ घुलकावीत मान पैं ॥५४॥

तों नरनारी असंख्यात ॥ कलश घेऊन उदक आणित ॥ पुच्छ गोंवून अकस्मात ॥ कपी फोडितो एकदांचि ॥५५॥

नारी दचकल्या समस्त ॥ कोण गे येथें घागरी फोडीत ॥ त्यांचे कर्णनासिकीं हनुमंत ॥ पुच्छ घालित हळूचि ॥५६॥

तेणें दुश्र्चिंत नारी दचकती ॥ एक फडांफडां शिंकती ॥ भरला घट मारुती ॥ जाऊं नेदी नगरांत ॥५७॥

घटस्फोट जाहले राजद्वारीं ॥ शिव्या देती नगरींच्या असुरी ॥ दशमुखा तुझी न उरे उरी ॥ जनककुमारी क्षोभली ॥५८॥

सीतेनें चेतविलें भूत ॥ तें नगरांत हिंडे गुप्त ॥ हें लंकेचा करील निःपात ॥ दशकंठ यथार्थ निमेल ॥५९॥

तों राजदर्शनासी महावीर ॥ तुरंग धरूनी ॥ गरगरां भोवंडोनि आपटी मेदिनीं ॥ एकावरी एक उचलोनी ॥ अश्र्वासहित स्वार टाकी ॥६१॥

तों गजभार आले उन्मत्त ॥ त्यांचे पुच्छें उपडोनियां दांत ॥ वरी बैसले असुर समस्त ॥ दंतघायें झोडिले ॥६२॥

गुढारांसहित गज उचलोनी ॥ भिरकावित समुद्रजीवनीं ॥ तों रथारूढ होऊनि ॥ राजकुमार पातल ॥६३॥

तंत वितंत घन सुस्वर ॥ वाजवीत वाद्यांचे गजर ॥ देखतां क्षोभला वानर ॥ पुच्छ सत्वर सोडिलें ॥६४॥

शतांचे शत रथ ओढोनी ॥ कुमार पालथे पाडिले मेदिनी ॥ सारथी भिरकाविले गगनीं ॥ घोडे मारून टाकिले ॥६५॥

पुच्छघायेंकरूनीं ॥ वाजंत्री झोडिले ते क्षणीं ॥ वाद्यें गेली सकळ गळोनी ॥ शंख करित पळती ते ॥६६॥

तों पालखील बैसोन प्रधान ॥ आले देखोनि वायुनंदन ॥ सूक्ष्म पुच्छ करून ॥ भोयांचे कानीं सूदिलें ॥६७॥

भोई दचकले एकाएकीं ॥ खालती आपटिली पालखी ॥ त्यांतें प्रधान धरोनि जवळिकीं ॥ ताडण करिती बहुसाल ॥६८॥

ते म्हणती कां मारितां व्यर्थ ॥ श्रावणारिस्नुषेनें चेतविलें भूत ॥ तें तुमचा अपमान करित ॥ शिबिका बहुत मोडिल्या ॥६९॥

पालख्या रथ गज घोडे ॥ झोडून पाडिले एकीकडे ॥ कोणी न ये राजद्वाराकडे ॥ जो तो दडे सांधीकोनीं ॥१७०॥

सवेंच उठोनि मारुति ॥ घरोघरीं घेत पाळती ॥ सीतेची गोष्टि कोणे रीती ॥ कैसें बोलती म्हणोनियां ॥७१॥

असो अस्ता गेला चंडकिरण ॥ सभामंडपीं बैसला रावण ॥ तये सभेंत अंजनीनंदन ॥ प्रवेशता पैं जाहला ॥७२॥

सिंहासनीं बैसला लंकानाथ ॥ पाठीसी उभा रामदूत ॥ तों सभेस घरटीकार सांगत ॥ रावणासन्मुख वर्तलें तें ॥७३॥

म्हणती शक्ररिजनका अवधारीं ॥ दुष्ट विघ्नें उदेलीं नगरीं ॥ लक्षांचे लक्ष फुटल्या घागरी ॥ नगरद्वारीं लंकेशा ॥७४॥

उगीच पडती गोपुरें ॥ बहुसाल रिचवती मंदिरें ॥ गगनमार्गीं टाकिलीं लेंकुरें ॥ कपाटें समग्र मोडिलीं ॥७५॥

वीर पडले म्हणताती ॥ निद्रिस्त जन वोसणती ॥ दुश्र्चिन्हें बहुत लंकापती ॥ शंका वाटे सांगतां ॥७६॥

ताटिकांतकाची कांता झडकरी ॥ नेऊन सोडावी कांतारीं ॥ इतुकेन स्वस्थ लंकापुरी ॥ चिरकाळ नांदेल ॥७७॥

ऐसें बोलतां धरटीकार ॥ क्रोधावला द्विपंचवक्र ॥ म्हणे याची जिव्हा आणि श्रोत्र ॥ छोदोनियां टाका ॥७८॥

नसतें कल्पित दुश्र्चिन्ह ॥ सांगतो मूर्ख आम्हांलागून ॥ ऐसें ऐकतां वचन राघवप्रियकर क्षोभला ॥७९॥

म्हणे लटिकें दुश्र्चिन्ह ॥ यासीच दावूं खरें करून ॥ माझे पुच्छासी होवो बहु कल्याण ॥ करीन कंदन सभेचें ॥१८०॥

तों रावणापुढें नापिक येत ॥ शस्त्रें श्मश्रु नीट करित ॥ तों नापिकाचे कर्णीं हनुमंत ॥ पुच्छ घाली हळूचि ॥८१॥

तों नापिक भयें दचकला ॥ तेणें हात चांचरी गेला ॥ मिशी भादरली ते वेळां ॥ एकीकडील अवघीच ॥८२॥

तेणें क्षोभला लंकानाथ ॥ हस्तें ताडिला नापिक ॥ रावणाचे पृष्ठीवरी देख ॥ हनुमंतें मुष्टि ओपिली ॥८३॥

वामहस्तचपेटेंकरूनी ॥ दाही छत्रें पाडिलीं धरणीं ॥ सवेंच दाही मुकुट हाणोनी ॥ सव्यहस्तें पाडिले ॥८४॥

छत्रदंड घेवोनि करीं ॥ घाली रावणाचे अपानद्वारीं ॥ येरू मागें पाहे ते अवसरीं ॥ तों दंड माझारी खंडिला ॥८५॥

चौदा गांवें मंडप विस्तीर्ण ॥ सुगंधस्नेहें दीप शोभायमान ॥ चौदा सहस्र लाविले पूर्ण ॥ ठायींठायीं सुरेख ॥८६॥

कर्पूरदीप सतेज थोर ॥ आठ लक्ष सभेसमोर ॥ पाजळोन उभे असती असुर ॥ विशाळ शरीरें जयांचीं ॥८७॥

पुच्छघातें वायुकुमरें ॥ दीपिका विझविल्या एकसरें ॥ दीप तेथें एकही न उरे ॥ जाहले घाबरे सभालोक ॥८८॥

अंधार पडतांचि तेथ ॥ नागवूं लागला हनुमंत ॥ शस्त्रवस्त्रादि समस्त ॥ अलंकार घेत हिरोनि ॥८९॥

मुकुट घेऊन सत्वर ॥ मस्तकीं हाणी मुष्टिप्रहार ॥ जैसा सपक्ष नगावरी पुरंदर ॥ वज्र बळें प्रेरी पैं ॥१९०॥

बोटें तोडोनि मुद्रिका सकळ ॥ काढून घेत अंजनीबाळ ॥ कंठ पिळोन काढी माळ ॥ करिती कल्होळ असुर तेव्हां ॥९१॥

मुष्टिघातें हृदय फोडूनि ॥ मग घेत पदक काढूनि ॥ पादप्रहारें माज मोडूनि ॥ मग ओढीत कडदोरा ॥९२॥

नेसलीं वस्त्रें घेत हिरोनि ॥ सवेंच लिंग टाकी तोडोनि ॥ एक वस्त्रें फेडोनि ॥ अगोदर टाकिती ॥९३॥

एक म्हणती आयुष्य जाहलें जरी ॥ वस्त्रालंकार देखों संसारी ॥ परी लिंगाविण जन्मवरी ॥ काय म्हणोनि कंठावें ॥९४॥

राक्षसांचे चरण मोडूनि ॥ मग ब्रीदें घेतलीं काढूनि ॥ एक हांक फोडिती ते क्षणीं ॥ घ्राण छेदोनि टाकित ॥९५॥

एकासी एक दाविती खूण ॥ बोलूं नका रे वांचवा प्राण ॥ एक म्हणती निर्मूळ करावया पूर्ण ॥ महद्भुत उदेलें ॥९६॥

आणिली श्रीरामाची कांता ॥ सतियां शिरोमणि पतिव्रता ॥ तिणेंच हें भूत चेतवितां ॥ प्रळय जाहला लंकेसी ॥९७॥

अंधार पडला दारुण ॥ सुटला अद्भुत प्रभंजन ॥ दीपिका आणितां जाती विझोन ॥ अनर्थ पूर्ण ओढवला ॥९८॥

एक म्हणती कोठें लंकानाथ ॥ एक म्हणती मेला कीं जित ॥ जवळ असतां न कळे मात ॥ थोर प्राणांत ओढवला ॥९९॥

देवांतक नरांतक राजसुत ॥ अतिकाय इंद्रजित ॥ मत्त महामत्त युद्धोन्मत्त ॥ प्रहस्तादि नागविले ॥२००॥

उघडोनियां सभाद्वार ॥ कोणी जाऊं न शके बाहेर ॥ होत पुच्छाचा घोर मार ॥ दडती असुर ठायीं ठायीं ॥१॥

भयभीत दशकंधर ॥ म्हणे सत्य बोलिला घरटीकार ॥ प्रचंड हें विघ्न दुस्तर ॥ आलें साचार प्रत्यया ॥२॥

रावणाचे पृष्ठीवरी मार ॥ वज्रप्राय होत थोर ॥ बोलूं न शके अणुमात्र ॥ घ्राण छेदील म्हणोनी ॥३॥

रावणाचे कानीं हनुमंत ॥ हळूच जावोनि सांगे मात ॥ जनकजापतीचा मी दूत ॥ त्रासीन नगर समस्त हें ॥४॥

तुझी छेदोनी दाही शिरें ॥ किष्किंधेसीं नेईन क्षणमात्रें ॥ परी त्या अयोध्याधीशें उदारें ॥ आज्ञा नाहीं दीधली ॥५॥

ऐसें सांगतां वायुनंदन ॥ मनीं भ्रमित झाला द्विपंचवदन ॥ कर्णी सांगितलें वर्तमान ॥ कळलें नाहीं रावणा ॥६॥

ऐसा प्रळय करूनि थोर ॥ निघोन गेला वायुपुत्र ॥ नागविले प्रतापें वीर ॥ दशवक्रादिकरोनियां ॥७॥

दीपिका आणिल्या तात्काळ ॥ तों नागवेचि असुर सकळ ॥ कित्येक मूर्च्छा येऊनि विकळ ॥ बहुत पडले धरणीये ॥८॥

कित्येकांचे मोडले करचरण ॥ बहुतांचे तोडिले कर्णघ्राण ॥ एक लिंग तोडिलें म्हणोन ॥ रावणासी दाखविती ॥९॥

दुःखें व्याप्त पिशिताशन ॥ स्वसदना गेला उठोन ॥ चिंताक्रांत दशवदन ॥ राणिवसांत प्रवेशला ॥२१०॥

रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हें विश्रांतीचें दिव्य मंदिर ॥ येथें पहुडले सज्ञान नर ॥ जे रघुवीरउपासक ॥११॥

जे मतिमंद अज्ञानी जन ॥ सेविताती अविद्यारण्य ॥ त्यांसी हें रामविजयसदन ॥ प्राप्त नोहे सहसाही ॥१२॥

विषकंठहृदया रघुनंदना ॥ श्रीरामा दशकंठदर्पहरणा ॥ श्रीधरवरदा जगद्भूषणा ॥ ब्रह्मानंदा सुखाब्धि ॥१३॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनविंशतितमोध्याय गोड हा ॥२१४॥

श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ अध्याय १९ ॥

श्रीरामविजयअध्याय २० वा

श्रीगणेशाय नमः

जैसे दुर्बळाचिया गृहाप्रति ॥ समर्थ सोयरे येती ॥ त्यांसी पाहुणेर करावया निश्र्चिती ॥ नाहीं शक्ति तयातें ॥१॥

मग तो कंदमूळें आणून ॥ पुढें ठेवी प्रीतीकरून ॥ तैसे हे प्राकृत बोल पूर्ण ॥ संतांपुढें समर्पिले ॥२॥

पयोब्धीपुढें ठेविलें तक्र ॥ कीं सुरभीपुढें अजाक्षीर ॥ अमृतापुढें साखर ॥ नेऊनियां समर्पिली ॥३॥कुबेरापुढें कवडी जाण ॥ रंकें ठेविली नेऊन ॥ शीतळ व्हावया रोहिणीरमण ॥ नवनीत पुढें ठेविलें ॥४॥

कल्पद्रुमापुढें बदरीफळ ॥ वैरागराचे कंठीं स्फटिकमाळ ॥ मलयगिरीसी गंध शीतळ ॥ निंबकाष्ठाचें चर्चिलें ॥५॥

जो ब्रह्मांडप्रकाशक गभस्ति ॥ त्यासी ओंवाळिजे एकारती ॥ परी तो घेत देखोन भक्ति ॥ ऐसेंचि येथें संतीं केलें ॥६॥

तैसे बोल हे हीन जाण ॥ परी संतांसी आवडी पूर्ण ॥ एकुणिसावे अध्यायीं कथन ॥ काय जाहलें तें परिसा हो ॥७॥

असुरांतें देखोनि हनुमंत ॥ सभा नागवूनि समस्त ॥ पुरुषार्थ करोनि अद्भुत ॥ गेला गुप्तरूपेंचि ॥८॥

लंकेचीं मंदिरें समस्त सीतेलागीं शोधी हनुमंत ॥ जैसा रत्नपरीक्षक निरीक्षित ॥ रत्न आपुलें हारपलें ॥९॥

धांडोळिली लंका नगरी ॥ कोठें नुमगे जनककुमरी ॥ जेथें होतीं रावण-मंदोदरी ॥ तेथें हनुमंत पातला ॥१०॥

तंव तो शक्रारिजनक ॥ हवन करी विघ्नाशक ॥ शेजेवरी निजली निःशंक ॥ पट्टराणी मंदोदरी ॥११॥

उपरमाडिया गोपुरें ॥ राणिवसाचीं दामोदरें ॥ ऐशीं सहस्र अंतःपुरें ॥ सीतेलागीं शोधिलीं ॥१२॥

सकळ स्त्रियांचे मंदिरांत ॥ रिघोन पाहे हनुमंत ॥ जो महाराज इंद्रियजित ॥ काम रुळत तोडरी ॥१३॥

रावणें आणिल्या नारी ॥ नागिणी पद्मिणी किन्नरी ॥ ज्यांचिया पदनखांवरी ॥ भ्रमर रुंजी घालिती ॥१४॥

ऐशा सुंदरी देखत ॥ परी काममोहित नव्हे हनुमंत तो राघवप्रिय अतिविरक्त ॥ ऊर्ध्वरेता वज्रदेही ॥१५॥

घटमठांमाजी व्यापून ॥ वेगळें असे जैसें गगन ॥ तैसाचि अंजनीनंदन ॥ लोकांत वर्तूनि वेगळा ॥१६॥

स्त्रिया शोधिल्या समस्त ॥ तव मंदोदरी जेथें निद्रिस्थ ॥ तेथें येऊन हनुमंत ॥ उभा राहिला क्षणभरी ॥१७॥

सुरूप देखोनि मंदोदरी ॥ म्हणे हेचि होय विदेहकुमरी ॥ निजेली पवित्रपणें शेजेवरी ॥ पतिव्रता म्हणोनियां ॥१८॥

सतियां शिरोरत्न सीता सती ॥ परमपुरुषाची चिच्छक्ति ॥ मज आजि भेटली निश्र्चितीं ॥ म्हणोन मारुती नाचत ॥१९॥

तों होमविधि संपादून ॥ तेथें आला द्विपंचवदन ॥ तों मंदोदरी उठोन ॥ पाय धूत पतीचे ॥२०॥

ऐसें देखोन हनुमंत ॥ क्षोभला जैसा प्रळयकृतांत ॥ म्हणे जानकी होय यथार्थ ॥ वश्य जाहली रावणातें ॥२१॥

रामवचन आठवी मारुति ॥ सीतेचे वदनीं कर्पूरदीप्ति ॥ मग मुखाजवळी त्वरितगति ॥ मंदोदरीच्या पातला ॥२२॥

मुख तिचे अवघ्राणिलें ॥ तों दुर्गंधीनें मन विटलें ॥ म्हणे मद्यपान आहे केलें ॥ उभयवर्गीं मिळोनियां ॥२३॥

भिंतीस लावतां कान ॥ होत नाहीं रामस्मरण ॥ हे रावणासी मानली पूर्ण ॥ तेथें स्मरण कायसें ॥२४॥

तों रावण आणि मंदोदरी ॥ दोघें निजलीं शेजेवरी ॥ सुषुप्तिअवस्थेमाझारी ॥ निमग्न जाहलीं ते वेळे ॥२५॥

मनी विचारी हनुमंत ॥ या दोघांसी उचलोनि त्वरित ॥ किष्किंधेसी न्यावीं यथार्थ ॥ पाहील रघुनाथ दोघांतें ॥२६॥

किंवा घालून चंड पाषाण ॥ दोघांचे येथेंच घेऊं प्राण ॥ ऐसें विचारी वायुनंदन ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥२७॥

अकस्मात गजबजोनी ॥ मंदोदरी बैसली उठोनी ॥ आक्रोशें हांक फोडोनी ॥ वक्षःस्थळ बडवित ॥२८॥

सवेंचि महाशंख करित ॥ दशकंठ धरी तिचे हात ॥ मयजा म्हणे अतित्वरित ॥ सीता द्या हो रामाची ॥२९॥

आजि विलोकिलें दुष्ट स्वप्न ॥ माझी गळसरी गेली जळोन ॥ एक बळिया वानर येऊन अशोकवन विध्वंसिलें ॥३०॥

तेणें वधिला अखया सुत ॥ समरीं गांजिला इंद्रजित ॥ घेऊन आला जनकजामात ॥ हरिदळ अद्भुत न वर्णवे ॥३१॥

शिळीं बुजोनियां सरितानाथ ॥ सुवेळेसी आला अवनिजाकांत ॥ रावण कुंभकर्ण शक्रजित ॥ वधोनि विजयी जाहला असे ॥३२॥

स्वप्न नव्हे हें ब्रह्मवचन ॥ तरी मंगळभगिनी द्या नेऊन ॥ मंगळदायक रघुनंदन ॥ त्यासी शरण जावें जी ॥३३॥

करितां परदाराभिलाष ॥ कोण पावला मागें यश ॥ मानव नव्हे राघवेश ॥ पुराणपुरुष अवतरला ॥३४॥

उदरीं बांधोनि दृढ पाषाण ॥ केवीं तरेल अगाध जीवन ॥ बळेंचि केलें विषप्राशन ॥ त्यासी कल्याण मग कैचें ॥३५॥

खदिरांगाराचे शेजेवरी ॥ कैसा प्राणी निद्रा करी ॥ महासर्पाचे मुखाभीतरीं ॥ हस्त घालितां उरे कैसा ॥३६॥

शार्दूळ करूं गेला पलाटण ॥ त्याचे जाळीमाजी जाऊन ॥ नांदेन म्हणे क्षेम कल्याण ॥ तो प्राणी कैसा वांचेल ॥३७॥

तुम्ही जरी सर्वांसी जिंकिलें ॥ परी राघवेंद्रा तैसें न चले ॥ पूर्णब्रह्म अवतरलें ॥ भक्तजन रक्षावया ॥३८॥

यालागीं द्विपंचवदना ॥ मी शरण जात्यें रघुनंदना ॥ देवोनि तयाची अंगना ॥ चुडेदान मागेन ॥३९॥

मनीं विचारी लंकापति ॥ इचें वचन सर्व मानिती ॥ नेऊन देईल सीता अवचितीं ॥ भलत्यासी आज्ञा करूनियां ॥४०॥

रावण म्हणे मंदोदरी ॥ तूं सर्वथा चिंता न करीं ॥ उदयीक नेऊन जनककुमारी ॥ जनकजामाता देईन ॥४१॥

पांचकोटी राक्षसगण ॥ अशोकवनाभोंवतें रक्षण ॥ तयांसी सांगोन पाठवी रावण ॥ रात्रंदिवस सावध असावें ॥४२॥

बिभीषण कुंभकर्ण इंद्रजित ॥ हे मयजेसी मानिती बहुत ॥ यांचा विश्र्वास न धरावा यथार्थ ॥ नेऊन देतील जानकीतें ॥४३॥

ऐसें समस्त वर्तमान ॥ वायुसुतें केलें श्रवण ॥ म्हणे मंदोदरी सती धन्य ॥ इच्या स्मरणें दोष नुरे ॥४४॥

तो दूतीस म्हणे दशकंधर ॥ अशोकवना जाऊनि सत्वर ॥ जनकात्मजेचा समाचार ॥ घेऊन येईं त्वरेनें ॥४५॥

तात्काळ चालिली दूती ॥ तयेमागें जाय मारुति ॥ आला अशोकवनाप्रति ॥ आनंद चित्तीं न समाये ॥४६॥

तों अशोकवृक्षाचे तळीं ॥ ध्यानस्थ बैसली मैथिली ॥ दूती परतली तात्काळीं ॥ हनुमंत तेथे राहिला ॥४७॥

जय जय रघुवीर रघुवीर अयोध्यानाथ ॥ म्हणोनि नाचों लागला हनुमंत ॥ म्हणे धन्य मी आजि येथ ॥ जगन्माता देखिली ॥४८॥

पुच्छा नाचवी कडोविकडी ॥ तों विटावी डोळे मोडी ॥ चक्राकार मारी उडी ॥ रामनाम गर्जोनियां ॥४९॥

चहूंकडे पाहे मारुति ॥ तों रामनामें वृक्ष गर्जती ॥ पंचभूतें पक्षी घुमती ॥ रामस्मरणें करूनियां ॥५०

म्हणे हे होय सीता सती ॥ पुराणपुरुषाची चिच्छक्ति ॥ सुटली कर्पूराची दीप्ती ॥ पाषाण स्मरती रामनाम ॥५१॥

मृगमदाहूनि विशेष ॥ सीतेच्या अंगींचा सुवास ॥ अशोकवन आसपास ॥ दुमदुमिलें तेणेंचि ॥५२॥

तेथें रक्षण असे त्रिजटा ॥ तिनें राघवी धरिली निष्ठा ॥ सत्संगाचा महिमा मोठा ॥ दुष्ट पापिष्ठा सद्भाव उपजे ॥५३॥

यावरी अंजनीहृदयरत्न ॥ गुप्तरूपें जवळ येऊन ॥ जानकीचे वंदोनि चरण ॥ मुद्रिका पुढें ठेविली ॥५४॥

ध्यानस्थ बैसली सीता सती ॥ मानसीं चिंती रघुपति ॥ पुढें उभा असे मारुति ॥ बद्धांजलि करूनियां ॥५५॥

इंदिरेपाशीं खगेंद्र ॥ कीं अपर्णेंसमीप नंदिकेश्र्वर ॥ कीं शचीपुढें जयंत पुत्र ॥ उभा ठाके प्रीतीनें ॥५६॥

असो कनकदंड पडे पृथ्वीवरी ॥ तैसा जानकीसी नमस्कारी ॥ मग अशोकवृक्षावरी ॥ राघवप्रिय ओळंघला ॥५७॥

इकडे तमालनीळ सांवळा ॥ ध्यानीं विलोकित जनकबाळा ॥ तों अवतारमुद्रिका ते वेळां ॥ सव्यकरांगुळीं दिसेना ॥५८॥

मुद्रिका न दिसे म्हणोन ॥ श्रावणारिस्नुषा उघडी नयन ॥ तों मुद्रिका पुढेंचि जाण ॥ दैदीप्यमान पडली असे ॥५९॥

मुद्रिका देखतां ते वेळीं ॥ हृदयीं आलिंगी जनकबाळी ॥ विमलांबुधारा नेत्रकमळीं ॥ जानकीच्या सूटल्या ॥६०॥

म्हणे सांडोनि रघुत्तमातें ॥ माये कैशी आलीस येथें ॥ राम आणि सौमित्रांतें ॥ त्यजोनि कोठें आलीस ॥६१॥

जगद्वंद्य तो श्रीराम ॥ जो चराचरफलांकितद्रुम ॥ त्याची वार्ता स्वस्तिक्षेम ॥ सांग मुद्रिके मजपाशीं ॥६२॥

तों त्या वनीं निशाचरी ॥ तेथें होत्या दुराचारी ॥ विक्राळरूपें ते अवसरीं ॥ सीतेजवळी धांविन्नल्या ॥६३॥

कां गे रडतीस म्हणोन ॥ पसरोनि आल्या विक्राळ वदन ॥ तुज आम्हीं भक्षूं तोडून ॥ कुटके करोन तिळप्राय ॥६४॥

कैंचा राम तमालनीळ ॥ तूं रावणासी घाली माळ ॥ राक्षसीणी करिती कोल्हाळ ॥ सीते भोंवत्या मिळोनियां ॥६५॥

बाबरझोटी भयंकर ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ लंबस्तनें विशाळ उदर ॥ पर्वत माजीं सांठवती ॥६६॥

असो ऐसें देखोनि हनुमंत ॥ पुच्छ सोडी अकस्मात ॥ राक्षसिणी झोडिल्या समस्त ॥ प्राणांसी बहुत मुकल्या ॥६७॥

राक्षसिणी फिरविती डोळे ॥ पुच्छें आंवळिले दृढ गळे ॥ एक म्हणती जनकबाळे ॥ रक्षीं माते आम्हांसी ॥६८॥

निमाल्या बहु राक्षसिणी ॥ उरल्या लागती सीतेच्या चरणीं ॥ कित्येक गेल्या पळोनी ॥ दशकंठातें सांगावया ॥६९॥

हृदयीं बोध प्रगटतां जाणा ॥ भ्रांती भुली इच्छा वासना ॥ आशा मनशा तृष्णा कल्पना ॥ पळती जैशा क्षणार्धें ॥७०॥

तैशा पळाल्या निशाचरी ॥ जानकी मुद्रिकेतें विचारी ॥ शरयूतीरविहारी ॥ कोठें सांग मुद्रिके ॥७१॥

मज आलिंगितां श्रीरामचंद्र ॥ तेव्हां कंठीं न सोसेचि हार ॥ आतां गिरि कानन समुद्र ॥ दोघांमध्यें पडियेले ॥७२॥

वाल्मिकानें भाष्य कथिलें ॥ तें काय सर्व व्यर्थ गेलें ॥ एक कपि बलिया येऊन बळें ॥ लंकानगर जाळील ॥७३॥

मज देऊनि समाधान ॥ सवेंचि आणील रघुनंदन ॥ पाषाणीं समुद्र बुजवोन ॥ दशवदनासी मारील पैं ॥७४॥

तों मुद्रिका नेदी प्रतिवचन ॥ म्हणे मज कळली खूण ॥ माझ्या विरहेंकरून ॥ देह राघवें त्यागिला ॥७५॥

कीं योगियांचें ध्यानीं गुंतला ॥ कीं भक्त धांवण्या धांवला ॥ कीं सौमित्रें माघारा नेला ॥ म्यां छळिलें म्हणोनियां ॥७६॥

कृपा न करवे मजवरी ॥ तरी येऊन माझा वध करीं ॥ मी बुडाल्यें चिंतासमुद्रीं ॥ काढी बाहेरी त्वरेनें ॥७७॥

अहा रामा राजीवनेत्रा ॥ दशकंठरिपु विषकंठमित्रा ॥ पुढें पाठविली कां हे मुद्रा ॥ कोण्या विचारेंकरूनियां ॥७८॥

मृगत्वचेची कंचुकी इच्छिली ॥ हाच अन्याय घडला मुळीं ॥ म्यां पापिणीनें ते वेळीं ॥ सौमित्र वीर छळियेला ॥७९॥

म्यां साधुछळण केलें ॥ म्हणोन राक्षसां हातीं सांपडलें ॥ मजला वियोगदुःख घडलें ॥ त्याच दोषें करूनियां ॥८०॥

जे साधुछळण करिती ॥ ते मज ऐसें दुःख पावती ॥ अंती जाती अधोगती ॥ महाअनर्थी पडती ते ॥८१॥

इत्यादि भाव तये क्षणीं ॥ दावी त्रिभुवनपतीची राणी ॥ म्हणे हा देह ठेवूनि ॥ काय कारण पैं असे ॥८२॥

सीता देखोन विव्हळ ॥ वृक्षगर्भी अंजनीबाळ ॥ गायन आरंभी रसाळ ॥ राघवलीला निर्मळ जे ॥८३॥

तो साक्षात रुद्रावतार ॥ रुद्रवीणा जैसा सुस्वर ॥ तैसा कंठ अति मधुर ॥ कंपस्वर गातसे ॥८४॥

कपीचे गायन रसाळ ॥ तटस्थ जाहलें रविमंडळ ॥ पाताळ सांडोन फणिपाळ ॥ येऊ भावी तेथें पैं ॥८५॥

तटस्थ जाहला प्रभंजन ॥ वेधला चंद्राचा हरिण ॥ अशोकवनीचे द्विजगण ॥ चारा घेऊं विसरले ॥८६॥

अयोध्यापतीची राणी ॥ तल्लीन होऊन ऐके श्रवणीं ॥ अशोकवृक्षामधोनि ॥ मंजुळ ध्वनि उमटत ॥८७॥

जो अजअजित निर्गुण ॥ कमलमित्रकुळभूषण ॥ भक्तहृदयमिलिंद पूर्ण ॥ जलदवर्ण जलजाक्ष ॥८८॥

जो मंगलधाम मंगळकारक ॥ जो मंगलभगिनीप्राणनायक ॥ मंगलजननीउद्धारक ॥ प्रतापार्क श्रीराम ॥८९॥

जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो चंडीशकोदंडप्रभंजन ॥ भवगजविदारण पंचानन ॥ नरवीरांतक जो ॥९०॥

जानकी जयाची चित्कळा ॥ रची अनंत ब्रह्मांडमाळा ॥ तो रघुवीर परब्रह्मपुतळा ॥ अतर्क्य लीला जयाची ॥९१॥

सच्चिदानंदतनु निष्कलंक ॥ पितृआज्ञाप्रतिपालक ॥ जो मायाचक्रचालक ॥ जगद्वंद्य जगद्रुरु ॥९२॥

जो पंचमहाभूतां वेगळा साचार ॥ तो पंचवटीवासी रघुवीर ॥ तेथें द्विपंचवदन सत्वर ॥ कपटमृग घेवोनि गेला ॥९३॥

तो द्विपंचवदन दुराचार ॥ पर्णकुटींत प्रवेशला तस्कर ॥ भूगर्मींचे रत्न सुंदर ॥ हरोनि नेलें क्षण न लागतां ॥९४॥

त्या तस्कराचा मार्ग काढीत ॥ किष्किंधेसी आला जनकजामात ॥ शक्रसुत वधोनि अकस्मात ॥ अर्कज राज्यीं स्थापिला ॥९५॥

त्या सीतावल्लभाचा किंकर ॥ दासानुदास एक वानर ॥ तेणें गांजोनि लंकानगर ॥ अशोकवना आला असे ॥९६॥

ऐसें ऐकतां गायन ॥ आनंदमय भूतनयेचें मन ॥ मग वृक्षाजवळीं उभी राहून ॥ करी नमन तयातें ॥९७॥

म्हणे धन्य धन्य तूं तरुवरा पूर्ण ॥ कोण करी तुजमाजी कीर्तन ॥ त्याचें पाहीन मी वदन ॥ धरीन चरण आदरें ॥९८॥

जो करितो तुजमाजी कीर्तन ॥ त्याची जननी धन्य धन्य ॥ त्यासी सदा असो कल्याण ॥ नलगे विघ्न कल्पांतीं ॥९९॥

ज्यासी रामकीर्तन आवडे ॥ त्यासी सांकडें कदा न पडे ॥ चारी मुक्ति तयापुढें ॥ दासी होऊनि राबती ॥१००॥

ऐसें जगन्माता बोलत ॥ तों उगाचि राहिला हनुमंत ॥ न बोले कांहीच मात ॥ पाहे तटस्थ जानकी ॥१॥

म्हणे येथें कापट्य पूर्ण ॥ कोण करितो न कळे कीर्तन ॥ बाहेर न भेटे येऊन ॥ तरी आतां प्राण सांडीन मी ॥२॥

अत्यंत कृश जाहली गोरटी ॥ मुद्रिका घातली मनगटीं ॥ म्हणे अयोध्यापति जगजेठी ॥ नव्हे भेटी तुझी आतां ॥३॥

मग जनकात्मजेनें ते वेळां ॥ वेणीदंड वेगें काढिला ॥ त्याचा गळां पाश घातला प्राणत्यागाकारणें ॥४॥

म्हणे अयोध्यापति तुजविण ॥ मी क्षण एक न ठेवीं प्राण ॥ ऐसें बोलोनियां वचन ॥ जनकात्मजा सरसावली ॥५॥

वेणीदंड काढोनि ॥ वृक्षडाहळीये बांधी तये क्षणीं ॥ राघवप्रिय तें देखोनि ॥ बहुत मनीं गजबजिला ॥६॥

जानकी त्यागील प्राणा ॥ मग काय सांगों रघुनंदना ॥ भरताग्रजा जगन्मोहना ॥ धांवें लौकरी ये वेळे ॥७॥

अंतरीं आठविले रामचरण ॥ बुद्धिप्रर्वतक म्हणोन ॥ मग तैसेंचि केलें उड्डाण ॥ गगनपंथें ते वेळां ॥८॥

अंजनी आत्मज ते वेळां ॥ गर्जोनि म्हणे पैल श्रीराम आला ॥ ऐसें बोलतां जनकबाळा ॥ ऊर्ध्वपंथें विलोकी ॥९॥

मारुती खालीं उतरून ॥ करिता जाहला साष्टांग नमन ॥ जगन्माता बोले वचन ॥ हो कल्याण चंद्रार्कवरी ॥११०॥

जोडोनियां दोनी कर ॥ उभा राहिला समोर ॥ म्हणे कल्याणरूप रघुवीर ॥ किष्किंधेसी सुखी असे ॥११॥

मी श्रीरामाचा अनुचर ॥ हनुमंतनामा वायुकुमर ॥ माते तुजकारणें लंकानगर ॥ धांडोळिलें सर्वही ॥१२॥

सीतेसी आनंद जाहला थोर ॥ जैसा बहुत दिवस गेला कुमर ॥ तो भेटतां हर्ष अपार ॥ तैसी निर्भय जाहली ॥१३॥

अवृष्टीं वर्षे घन ॥ कीं मृत्युसमयीं सुधारसपान ॥ कीं दुष्काळिया दर्शन ॥ क्षीरसिंधूचें जाहलें ॥१४॥

असो पंचवटीपासोन वर्तमान ॥ रामें लीला केली जी पूर्ण ॥ ती सीतासतीस वायुनंदन ॥ कथिता जाहला ते वेळीं ॥१५॥

जटायु उद्धरोनि कबंध वधिला ॥ वाळी मारोनि सुग्रीव स्थापिला ॥ तो अपार मेळवून हरिमेळा ॥ साह्य जाहला श्रीरामा ॥१६॥

आठवोन तव गुण स्वरूप ॥ राम सर्वदा करी विलाप ॥ श्र्वापदें पाषाण पादप ॥ सीता म्हणोनि आलिंगी ॥१७॥

तुवां जे अलंकार टाकिले ॥ ते म्यां श्रीरामापुढें ठेविले ॥ रामें शोक केला ते वेळे ॥ तो मज सर्वथा न वर्णवे ॥१८॥

तुजकारणें सौमित्र ॥ दुःखभरित अहोरात्र ॥ जैशी मातेची वाट निरंतर ॥ बाळक पाहे प्रीतीनें ॥१९॥

ऐसा ऐकतां समाचार ॥ जानकीस दाटला गहिंवर ॥ म्हणे परम कृपाळू रघुवीर ॥ मजकारणें शिणतसे ॥१२०॥

अयोध्येहूनि येतां हनुमंता ॥ मी मागें राहें चालतां ॥ श्रीराम तरूखालीं तत्वतां ॥ उभे राहती मजकारणें ॥२१॥

बहु श्रमलीस म्हणोन ॥ राम कुरवाळी माझें वदन ॥ बोलतां सीतेसी आलें रुदन ॥ सद्रद होऊन स्फुदतसे ॥२२॥

जानकीस म्हणे हनुमंत ॥ आतां शोक करिसी किमर्थ ॥ सत्वर येईल रघुनाथ ॥ दखमुखासी वधावया ॥२३॥

तूं आदिपुरुषाची चिच्छक्ति ॥ प्रणवरूपिणी मूळप्रकृति ॥ तुझे आज्ञेनें वर्तती ॥ विरिंचि रुद्र इंद्रादि ॥२४॥

भक्त तारावया निर्धारीं ॥ दोघें अवतरलां पृथ्वीवरी ॥ आधीं वियोग दोघांभीतरीं ॥ जाहलाचि नाहीं तत्वतां ॥२५॥

यावरी भूमिजा बोले वचन ॥ तूं श्रीरामाचा विश्र्वासी पूर्ण ॥ तुजप्रति अंतरखूण ॥ राघवें काय सांगितली ॥२६॥

येरू म्हणे कैकयीगृहांतरीं ॥ ताटिकांतकें आपुले करीं ॥ तुज वल्कलें नेसविली निर्धारीं ॥ खूण साचार ओळखें ही ॥२७॥

ऐसें ऐकतां जनकदुहिता ॥ म्हणे सखया हनुमंता ॥ तूं श्रीरामाचा पूर्ण आवडता ॥ कोटिगुणें अससी कीं ॥२८॥

परी तूं दिससी सूक्ष्म ॥ ऐसेच असतील प्लवंगम ॥ तरी हें लंकानगर दुर्गम ॥ तुम्हां कैसें आटोपे ॥२९॥

ऐसें सीतेचें वचन ऐकिलें ॥ हनुमंतें भीमरूप प्रकट केलें ॥ मंदाराचळातुल्य देखिलें ॥ विशाळ रूप मारुतीचें ॥१३०॥

कीं महामेरुचि अद्भुत ॥ कीं राक्षस वधावया समस्त ॥ अवतरला प्रळयकृतांत ॥ वानरवेष धरोनियां ॥३१॥

ऐसा देखानि रुद्रावतार ॥ सीता म्हणे हा केवळ ईश्र्वर ॥ रामकार्यालागीं निर्धार ॥ अवतरला येणें रूपें ॥३२॥

हनुमंत म्हणे महासती ॥ हे लंका घालीन पालथी ॥ परी कोपेल त्रिभुवनपति ॥ आज्ञा दिधली नाहीं मज ॥३३॥

जगन्माते मंगळभगिनी ॥ मजहूनियां प्रतापतरणी ॥ ऐसे वानर किष्किंधाभुवनीं ॥ रामाजवळी आहेत ॥३४॥

जांबुवंत नळ नीळ रविकुमर ॥ रणपंडित प्रतापशूर ॥ काळासी शिक्षा करणार ॥ राघवासवें असती पैं ॥३५॥

सीता म्हणे हनुमंतासी ॥ एवढा सागर कैसा तरलासी ॥ येरू म्हणे मुद्रेनें अनायासीं ॥ आणिलें मज ऐलतीरा ॥३६॥

मार्गीं जाहले श्रम बहुत ॥ तुझे दर्शन हरले समस्त ॥ परी जाहलों असें क्षुधाक्रांत ॥ फळें येथें दिसती बहु ॥३७॥

परहस्त ज्यास स्पर्शित ॥ तें सर्वथा नेघें मी निश्र्चित ॥ आतां आज्ञा दीजे त्वरित ॥ निजहस्तें घेईन मी ॥३८॥

उपरी बोले श्रीरामललना ॥ समीर स्पर्शो न शके या वना ॥ साठी सहस्र राक्षस रक्षणा ॥ ठेविले येथें लंकेशें ॥३९॥

हनुमंत ऐकतां ते अवसरीं ॥ गडबडां लोळे धरणीवरी ॥ फळआहाराविण बाहेरी ॥ निघों पाहती प्राण माझे ॥१४०॥

अहा मध्येंच आलें मरण ॥ अंतरले रघुपतीचे चरण ॥ आतां सीताशुद्धि सांगेल कोण ॥ कौसल्यात्मजासी जाऊनियां ॥४१॥

सफळ वृक्ष देखोन दृष्टीं ॥ माझें चित्त होतसे कष्टीं ॥ ऐसें वाटतसे पोटीं ॥ वनचि अवघें सांठवावें ॥४२॥

ऐसें बोलतां हनुमंत ॥ क्षण एक पडला निचेष्टित ॥ नेत्र गरगरां भोवंडित ॥ मुख पसरी फळांलागीं ॥४३॥

ऐसें देखोनि ते वेळीं ॥ जगन्माता सद्रदित जाहली ॥ अहा म्हणोन धांविन्नली ॥ कुरवाळित कृपाकरें ॥४४॥

म्हणे कपींद्रा उठीं उठीं ॥ पडली फळें तरुतळवटीं ॥ तीं पाहोनि एक मुष्टी ॥ घेईं उदरतृप्तीपुरतींच ॥४५॥

बा रे वरी चढसी जाण ॥ तरी तुज माझी असे आण ॥ पडलीं फळें ती वेंचून ॥ उदरनिर्वाह करीं कां ॥४६॥

ऐसें सीता बोलतां वचन ॥ मारुति उठिला झडकरून ॥ चरण धरी धांवोन ॥ म्हणे प्रमाण आज्ञा तुझी ॥४७॥

मग जे वृक्ष करिती रामस्मरण ॥ सीतेवरी छाया केली सघन ॥ ते रामउपासक पूर्ण ॥ करी वंदन कपि त्यांतें ॥४८॥

जो रामउपासक निर्मळ ॥ त्यासी विघ्न करूं न शके काळ ॥ म्हणोनि अंजनीचा बाळ ॥ तरु ते सकळ रक्षीत ॥४९॥

जे तरु न करिती रामस्मरण ॥ तेच उपटिले मुळींहून ॥ भुजाबळें त्राहाटून ॥ उर्वीवरी झोडिले ॥१५०

मग पडलीं फळें एकवटोनी ॥ हस्तद्वयें टाकी वदनीं ॥ हनुवटी हाले तेक्षणीं ॥ फळे तांतडी चावितां ॥५१॥

चंचळ दृष्टी करून ॥ मागें पुढें पाहे अवलोकून ॥ तंव ते वनरक्षक संपूर्ण ॥ निद्रार्णवीं बुडाले ॥५२॥

राक्षसांनी मद्य प्राशिलें ॥ हनुमंतें वन विध्वंसिलें ॥ पुढें पुच्छें उपडोनि आणिले ॥ वृक्ष भोंवते सर्वही ॥५३॥

हनुमंत बैसे फलहारासी ॥ पुच्छ पाहुणेर करी तयासी ॥ न सोडी बैसल्या ठायासी ॥ आपोशन मोडे म्हणोनी ॥५४॥

पुच्छासी हनुमंत बोले ॥ गोड गोड आणीं कां फळें ॥ आजि त्वां तृप्त आम्हां केलें ॥ चिरंजीव राहे तूं ॥५५॥

नंदनवनाहून सुंदर ॥ अशोकवनींचे तरुवर ॥ फणस इक्षुदंड लवंग परिकर ॥ उपडी समग्र एकदांचि ॥५६॥

केळी नारळी देवदार ॥ जंबू कपित्थ अंजीर ॥ ज्याचें रस लागती मधुर ॥ हनुमंतवीर सेवितसे ॥५७॥

असो तरुवर लक्षकोडी ॥ भुजाबळें उर्वीवरी झोडी ॥ राघव स्मरणें तांतडी ॥ फळें वदनीं टाकीतसे ॥५८॥

हनुमंत करीत यजन ॥ रामनाममंत्रेंकरून ॥ वदनकुंडीं आहुती पूर्ण ॥ घालोनि जठराग्नि तृप्त करी ॥५९॥

सीतेनें घातली आपुली आण ॥ वृक्षावरी न चढावें पूर्ण ॥ यालागीं वृक्ष झोडोन । फळें पाडी धरणीये ॥१६०॥

जैसी कां चपळा कडाडी ॥ तैसें पुच्छ वृक्ष मोडी ॥ तों राक्षस उठले तांतडी ॥ भीम कोल्हाळ करितचि ॥६१॥

चक्रें डांगा भिंडिमाळा ॥ घेऊन धांवले एकवेळां ॥ सीताशोकहरण कोंडिला ॥ सकळीं मिळोन एकदांचि ॥६२॥

वृषभीं कोंडिला महाव्याघ्र ॥ कीं बहुत विखारी खगेंद्र ॥ कीं श्रृगालीं वेढिला मृगेंद्र ॥ खद्योत दिनकरा धरूं म्हणती ॥६३॥

कीं मंथूनि सागर द्विज ॥ धरूं म्हणती प्रळयबीज ॥ कीं आर्द्रमृत्तिकेचे गज ॥ प्राशूं म्हणती जळसिंधु ॥६४॥

कर्पूरपुतळे म्हणती एकवेळां ॥ धरोनि आणूं वडवानळा ॥ मक्षिका मिळोनि सकळा ॥ भूगोल उचलूं भाविती ॥६५॥

उष्ट्रांनी ब्रीद बांधोन ॥ तुंबरापुढें मांडिलें गायन ॥ कीं वृश्र्चिक पुच्छेंकरून ॥ ताडीन म्हणे वज्रातें ॥६६॥

तैसे हनुमंतावरी वनरक्षक ॥ एकदांच धांवले सकळिक ॥ यावरी लोकप्राणेशबाळक ॥ काय करिता जाहला ॥६७॥

विशाळ वृक्ष उपडोनी ॥ सव्य करीं घेत तेच क्षणीं ॥ जैसा पावक शुष्कवनीं ॥ संहारी तैसा राक्षसां ॥६८॥

साठीं सहस्र वनपाळ ॥ पुच्छें भारे बांधिले सकळ ॥ फिरवूनियां तात्काळ ॥ भूमीवरी आपटिले ॥६९॥

जैसीं तुंबिनीचीं ओलीं फळें ॥ बळें आपटितां होतीं शकलें ॥ तैसे वनरक्षक ते वेळे ॥ चूर्ण जाहले सकळही ॥१७०॥

सवेंच समुद्रजीवनीं ॥ प्रेतें देत भिरकावूनी ॥ भुभुःकारें गर्जे तो ध्वनी ॥ गगनगर्भीं न समाये ॥७१॥

घायाळें उरलीं किंचित ॥ तीं रावणासमीप आलीं धांवत ॥ म्हणती एक वानर अद्भुत ॥ अशोकवनीं प्रगटला ॥७२॥

सकळ वन विध्वंसून ॥ वनरक्षक मारिले संपूर्ण ॥ ऐसें राक्षसेंद्रें परिसोन ॥ परम विषाद पावला ॥७३॥

तेव्हां ऐशीं सहस्र महावीर ॥ प्रेरिता झाला दशकंधर ॥ म्हणे धरोनि आणा रे वानर ॥ नानायत्नें करूनियां ॥७४॥

जरी नाटोपे तुम्हांलागून ॥ तरी मज दावूं नका वदन ॥ ऐशीं सहस्र पिशिताशन ॥ गर्जत वना पातले ॥७५॥

नानाशस्त्रें घेतलीं हातीं ॥ हांकें निराळ गाजविती ॥ ऐसें देखोन मारुति ॥ विशाळरूप जाहला ॥७६॥

जैसा मंदराचळ विशाळ ॥ तैसा दिसे अंजनीबाळ ॥ वासुकी ऐसें पुच्छा सबळ ॥ लंबायमान सोडिलें ॥७७॥

लंकेचे महाद्वारींची अर्गळा ॥ लोहबंदी वेष्टिला ते वेळां ॥ मारुति मारीत उठिला ॥ सिंहनादें गर्जत ॥७८॥

वृक्षावरी पक्षी उडोनी ॥ प्रातःकाळीं भरती गगनीं ॥ तैशीं अरिमस्तकें तुटोनि ॥ उसळोन धरणीं पडताती ॥७९॥

बांधोनी शत्रुसमुदायभार ॥ गगनीं फिरवी वायुकुमर ॥ आपटितां होती चूर ॥ करचरणादि अवयव ॥१८०॥

तों त्यांत मुख्य जंबुमाळी ॥ हांका देत पातला ते वेळीं ॥ म्हणे वानरा रणमंडळीं ॥ तुज आजि मारीन ॥८१॥

शूल घेवोनि ते वेळां ॥ बळें मारुतीवरी धांविन्नला ॥ तों हनुमंतें लत्ताप्रहार दिधला ॥ कोथळा फुटला तयाचा ॥८२॥

जैसें शस्त्र बैसतां प्रबळ ॥ चूर्ण होय फणसफळ ॥ कीं वज्रघातें महाशैल ॥ चूर्ण जैसा होय पैं ॥८३॥

ऐसा जंबुमाळी पडला ॥ चिरोन हनुमंतें भिरकाविला ॥ दशमुखास समाचार कळला ॥ अत्यंत कोपला ते काळीं ॥८४॥

मग पाठविले लक्ष वीर ॥ पांच सेनाधीश मुख्य थोर ॥ मल्ल प्रतिमल्लनामें असुर ॥ प्रचंड चंड जघन पैं ॥८५॥

रावणाची आज्ञा घेऊन ॥ वेगें पावला अशोकवना ॥ हें देखोन वायुनंदन ॥ अर्गळा हातीं तुळीतसे ॥८६॥

करोनि पुच्छाचें उखळ ॥ हातीं घेऊनि लोहमुसळ ॥ कांडीतसे लंकेशाचें दळ ॥ साळीऐसें तेधवां ॥८७॥

असुरदेह पडती अचेतन ॥ हाचि साळींचा कोंडा झाडून ॥ सूक्ष्मदेह तांदूळ पूर्ण ॥ जात उद्धरोनि कपिहस्तें ॥८८॥

करकरां कपि दाढा खात ॥ नेत्र गरगरां भोवंडित ॥ शस्त्रास्त्रें अवघे वर्षत ॥ पिशिताशन ऊठती ॥८९॥

मेरूऐसा सबळ ॥ जातां अंजनीचा बाळ ॥ तो तेथें देंखिलें देऊळ ॥ सहस्रस्तंभमंडित ॥१९०॥

तेथें रावणें देवी स्थापिली ॥ ब्राह्मणाचा देत नित्य बळी ॥ वायुसुतें ते वेळीं ॥ तें विदारिलें देवालय ॥९१॥

पायासकट उपडोन ॥ आकाशपंथें देत भिरकावून ॥ दशदिशांसी गेले पाषाण ॥ पक्ष्यांऐसे उडोनियां ॥९२॥

असो यावरी हनुमंतें ॥ लोहार्गळा घेवोनि हातें ॥ मांडिलें वीरकंदनातें ॥ गीत रामाचें गातसे ॥९३॥

अशोकवन तेचि खळें ॥ माजी वीरधान्य रगडिलें ॥ हनुमंत तिवडा मध्यें बळें ॥ पुच्छ फिरवीतसे ॥९४॥

तया खळियाजवळी ॥ खेचरदेवी जनकबाळी ॥ महावीरांचे दिधले बळी ॥ राशी केल्या शिरांच्या ॥९५॥

रेणुकेच्या कैवारें फरशधरें ॥ सर्व क्षत्रियांची छेदिलीं शिरें ॥ तैसें सीतेकारणें राघवकिंकरें ॥ संहारिले यामिनीचर ॥९६॥

असो हनुमंत ते वेळां ॥ असुर पुच्छें करूनि गोळा ॥ आपटोनि समुद्रजळा  माजी निक्षेपी साक्षेपें ॥९७॥

लक्ष वीर संहारिले ॥ मग सात पुत्र पाठविले ॥ तेही हनुमंतें चूर्ण केले ॥ अर्गळाघातेंकरूनियां ॥९८॥

हांक गेली रावणापाशीं ॥ वानरें संहारिलें समस्तांसी ॥ मग पाठविलें अखयासी ॥ दळभारेंसी तेधवां ॥९९॥

अखया देखोनि हनुमंत ॥ लोहर्गळा घेऊन नाचत ॥ गदगदां हंसूनि बोलत ॥ लंकेशात्मजासी तेधवां ॥२००॥

अरे अखया तुझें नाम व्यर्थ ॥ जैसे अजागळींचे स्तन यथार्थ ॥ कीं मूर्खासी अलंकार घातले सत्य ॥ बधिराचे श्रोत्र जैसे कां ॥१॥

कीं गर्भांधाचे नयन ॥ व्यर्थ काय विशाळ दिसोन ॥ कीं नासिकाविण वदन ॥ नामकरण तैसें तुझें ॥२॥

रासभासी भद्रासन ॥ श्र्वानासी अग्रपूजामान ॥ कीं दिव्यांबर परिधान ॥ व्यर्थ प्रेतास करविलें ॥३॥

तैसें अखया नाम दशमुखें ॥ तुज ठेविलें व्यर्थ शतमुखें ॥ आतां अखया तुझा क्षणएकें ॥ क्षय करीन जाणपां ॥४॥

मग अखया धनुष्य घेऊन ॥ सोडी बाणापाठीं बाण ॥ क्षण एक वायुनंदन ॥ उगाच उभा राहिला ॥५॥

काडिया पाडतां बहुत ॥ बैसका न सांडी पर्वत ॥ कीं सुमनवृष्टीनें मदोन्मत्त ॥ खेद सहसा न मानी ॥६॥

तैसे अखयाचे बाण ॥ येतां न भंगे वायुनंदन ॥ मग लोहार्गळा घेऊन ॥ कृतांतवत धांविन्नला ॥७॥

बैसता लोहार्गळेचे घाय ॥ अखयाचा जाहला क्षय ॥ समीरात्मज पावला जय ॥ सुरसमुदाय आनंदला ॥८॥

ऐकोनि अखयाचा समाचार ॥ शोकार्णवीं पडला लंकेश्र्वर ॥ आसाळी राक्षस भयंकर ॥ अशोकवना धाडिली ॥९॥

दहा सहस्र गजांचें बळ ॥ उदरांत सांठवी अचळ ॥ एक योजन मुख विशाळ ॥ पसरोनियां धांविन्नली ॥२१०॥

कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी भयंकर ॥ तिनें धांवोनि सत्वर ॥ वायुसुत धरियेला ॥११॥

उचलोनि घातला मुखांत ॥ दांतांसी दांत जो मेळवित ॥ तंव तों उतरला उदरांत ॥ क्षणमात्र न लागतां ॥१२॥

लंकेशासी सांगता हेर ॥ आसळीनें गिळिला वानर ॥ ऐकतां आनंदला दशशिर ॥ असुरसभेसहित पैं ॥१३॥

रावण शर्करा वांटित ॥ तों दूत आले शंख करित ॥ आसाळीचा जाहला अंत ॥ हनुमंतें पोट फोडिलें ॥१४॥

तिनं चाविला नसतां वानर ॥ सगळाचि गिळिला सत्वर ॥ यालागीं जितचि वीर ॥ उदर फोडोनि निघाला ॥१५॥

शोकाकुलित द्विपंचवदन ॥ म्हणे हें अद्भुत प्रगटलें विघ्न ॥ यावरी शक्रजित जाऊन ॥ युद्ध करील परिसा तें ॥१६॥

रामविजय ग्रंथ सुरस ॥ सुंदरकांड कौतुक विशेष ॥ श्रवण करोत सावकाश ॥ रघुवीर भक्त आदरें ॥१७॥

रविकुळमंडणा पुराणपुरुषा ॥ श्रीमद्भीमातटनिवासा ॥ ब्रह्मानंदा अविनाशा ॥ श्रीधरवरदा जगद्रुरो ॥१८॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ विंशतितमाध्याय गोड हा ॥२१९॥

॥ अध्याय ॥ ॥ २० ॥ ॥ ओंव्या ॥ ॥ २१९॥

॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

 

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af/feed/ 0
श्री दत्तावतारी माणिकप्रभु https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/#respond Sun, 21 Jan 2024 06:24:02 +0000 https://www.sadguruvani.in/?p=75

                                                      || जय गुरू माणिक श्री गुरू माणिक ||

माणिक प्रभू हे कल्याणीच्या मनोहर नाईकांचे पुत्र. आश्वलायनशाखीय देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शु. १४, श. १७३९ (श्रीदत्त जयंती)  या दिवशी झाला. त्यांची माता-पिता दोघेही परमार्थप्रवण आणि सत्त्वसंपन्न असल्यामुळे ‘शुद्ध बीजापोटी’ या रसाळ फळाचा उद्भव झाला. माणिक प्रभू हे दत्तात्रेयाचे चौथे अवतार समजले जातात. प्रथम श्रीदत्तात्रेय, द्वितीय श्री श्रीपादश्रीवल्लभ, तृतीय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, चतुर्थ श्री माणिकप्रभु महाराज.

माणिकप्रभूंचा हा दत्तावतार हिंदू व मुसलमान धर्मात सारखाच लोकप्रिय आहे. दोन्ही धर्माच्या लोकात त्यांचे अनेक भक्त आहेत. हा अवतार मोगलाईत निजाम (हैदराबाद) राज्यात, कल्याण गावी मनोहर नाईक व बयादेवी/बयाबाई या दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. श्रीदत्त भगवानांच्या आशीर्वादाने त्यांना तीन मुलगे झाले.

१) हणमंत (दादासाहेब)
२) माणिकप्रभु व
३) नरसिंह (तात्यासाहेब)

मनोहर नाईकांना रामनवमीच्या दिवशी दृष्टान्त झाल्याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंनी माणिकप्रभूंच्या रुपाने या दांपत्याच्या पोटी सन १८१७ मध्ये अवतार घेतला. बारशाच्या दिवशी त्या बालकाचे नाव ‘माणिक’ ठेवण्यात आले. त्याचे अनुपम तेज पाहून आजूबाजूचे लोक त्याच्या दर्शनाला येत असत. बयादेवींचे बंधू (प्रभूंचे मामा)  कल्याणच्या नवाबाच्या कचेरीत चाकरी करत असल्यामुळे मामांचा नवाबाशी घनिष्ट संबंध होता. नवाबांनी ज्यावेळी पहिल्यांदा प्रभूंचे दर्शन केले त्यावेळी त्याला प्रभूंच्या दैवीरूपाचे दर्शन झाले. आणि त्यामुळे नवाब साहेबांनी लाखो रुपयांचे अलंकार, दागिने व वस्त्राभूषणे प्रभूंना समर्पित केले. माणिकप्रभूंची देखभाल लहानपणापासून खूप प्रेमाने करण्यात आली  होती. त्यांच्या अंगावर हजारो रुपयांचे हिरे माणकांचे दागिने असत. त्यांच्या रक्षणासाठी पाच सहा अरब रोहिले शिपाई नबाबांनी ठेवले होते. पाचव्या वर्षानंतर श्रीप्रभूंची खेळकर वृत्ती वाढत गेली. कल्याण गावात माणिकप्रभू नावाचा दत्ताचा अवतार झाला आहे अशी बातमी गावभर पसरली. दर गुरुवारी लोक दर्शनाला येऊ लागले. सातव्या वर्षी श्रीप्रभूंची मुंज मोठ्या थाटाने झाली. सर्व ब्रह्मकर्म श्रीप्रभूंना मुखोद्गत होते. हा चमत्कार पाहून शास्त्री, पंडितही थक्क होत असत. प्रभु कधी शाळेत गेले नाहीत; परंतु लहानपणापासूनच त्यांना तेलगू, कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत आणि मराठी इतक्या भाषा लिहिता, वाचता व बोलता येत असत. चार वेद, सहा शास्त्रे व उपनिषदे यातही ते पारंगत होते. हे साक्षात ईश्वरी अवतार आहेत, अशी त्यांच्याविषयीची श्रद्धा त्यांच्या लहानपणापासूनच पसरत चालली होती. त्यांचे दर्शन, स्पर्शन आणि भाषण अमोघ असल्याचा प्रत्यय अनेकांना येत असे. त्यांना कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत व मराठी या भाषा उत्तम तर्‍हेने अवगत होत्या. शास्त्रचर्चेंत पंडितही त्यांच्यापुढे फिके पडत. ‘जणू वयसेचिया गावां न जातां’ बाळपणीच सर्वज्ञतेने त्यांना वरले होते. अभिजात सिद्धींचा प्रत्यय अगदी लहानपणापासूनच येऊ लागल्यामुळे त्यांच्या साधुत्वाचा डंका लवकरच सर्वत्र झडू लागला. भालकी गावाजवळील एका जंगलांतील गुहेत ते एक वर्षभर समाधी लावून बसले होते. हुमणाबादेजवळील अरण्यात त्यांनी एका बेलाच्या झाडाखाली निवास केला. तिथेच त्यांच्या नावाने ‘माणिकनगर’ वसले. माणिक प्रभूंच्या दत्तोपासनेच्या परंपरेला ‘सकलमत संप्रदाय’ असे नाव होते. नावावरूनच हे स्पष्ट आहे की, या संप्रदायात समन्वयाचा मोठा प्रयत्न झालेला आहे. या संप्रदायाचा असा सिद्धांत आहे की, जगातील सर्व धर्म व संप्रदाय हे त्यांच्या त्यांच्या अनुयायांना परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहेत. तेव्हा प्रत्येकाने अन्य संप्रदायांना विरोधी वा त्याज्य न मानता समन्वयाच्या उदार दृष्टीने त्यांतील सत्त्वांश ग्रहण करावा. या संप्रदायाचे उपास्य श्रीचैतन्यदेव ( आत्मदे – या विश्वात भरून उरलेले चैतन्यतत्त्व) हे आहे. या संप्रदायांत श्रीदत्तात्रेयाचे स्वरूप मधुमती नामक शक्तिसहित आराधिले जाते. ‘‘हा संप्रदाय अद्वैती व सर्वव्यापी असल्यामुळे अमक्याच एका देवतेचा मंत्र घेतला पाहिजे, असा आग्रह मुळीच नाही. कारण आपले सद्गुरूच नाना वेशांनी या जगात नटलेले आहेत, सर्व स्वरूपे त्यांचीच आहेत; म्हणून बाह्यत: भेद दिसला, तथापि वस्तुत: सर्व देवता एकरूपच आहेत, असा निश्चय ठेवून मंत्र घेतल्यास बाधक होणार नाही.’’

श्रीप्रभूंचे आंधळ्या पांगळ्यांवर, गरिबांवर जास्त प्रेम असे. हिंदू-मुसलमान दोन्ही भक्तांवर ते सारखेच प्रेम करीत. एके दिवशी कोणालाही न सांगता प्रभू घराबाहेर पडले. हुमणाबादपासून २० कोस दूर असलेल्या ‘मंठाळ’ गावात ते पोहोचले. हे कळताच श्रीप्रभूंच्या मातोश्री, तात्यासाहेबांना बरोबर घेऊन श्रीप्रभूंना भेटले. श्रीप्रभु आईंना म्हणाले की, श्री दत्तात्रेयांच्या साक्षात्काराप्रमाणे आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला. तुमचे मनोरथ पूर्ण केले. व्रतबंध होईपर्यत तुमच्या जवळ राहिलो. आता आम्हास सर्वत्र संचार करून भक्त जनांचा उद्धार करून अवतारिक कृत्ये केली पाहिजेत. तरी आमच्याविषयी दु:ख न करता घरी जाऊन दत्तसेवा करून कालक्रमणा करावी. मंठाळच्या अरण्यात अंबील कुंडाजवळील एका गुहेत ते गुप्तरीतीने राहिले. ही गुहा अद्याप तेथे असून तिला माणिकप्रभूंची गुहा असे म्हणतात.

नंतर श्रीप्रभु घरी आले लोकांना ही बातमी कळताच लोक दर्शनाला येऊ लागले. श्रीप्रभूंपुढे रुपयांचा ढीग पडू लागला. श्रीप्रभू ते सर्व पैसे गोरगरीबांना वाटून टाकत. मैलार गावी जाऊन प्रभूंनी त्यांच्या कुलदैवताची खंडोबाची महापूजा केली, त्याचे दर्शन घेतले व हजारो रुपयांचे वस्त्रालंकार देवास अर्पण केले. मैलारहून पुन: आपल्या गावी कल्याणला आले. त्या वेळी धाकटे बंधू तात्यासाहेब यांचे लग्न लावून दिले. या उदार समन्वयदृष्टीने माणिक प्रभूंच्या अनुयायी वर्गात हिंदूंबरोबर मुसलमानांचाही मोठा भरणा होता. हिंदूंतील लिंगायत पंथही त्यांना मानीत असे. अतिथि-पांथस्थ, तडी-तापडी, पंगु- रोगी या सर्वांना प्रभूंचे संस्थान हे एक विश्रामस्थान झाले होते. गरिबांचे दारिद्र्य जावे, निपुत्रिकांस संततिलाभ व्हावा, रोग्यांना आरोग्य प्राप्त व्हावे, संसारक्लान्त जीव समाधान पावावे,’’ असे त्यांच्या परिसरांतील वातावरण होते. जंगमांचा संक्रांतिमहोत्सव, मुसलमानांचा मोहरम आणि ब्राह्मणांची दत्तजयंती या उत्सवांसाठी त्यावेळी माणिकनगरांत प्रतिवर्षी तीस लाखांवर रक्कम खर्च होई !

असे योगेश्वर कृष्णासारखे दिव्य जीवन व्यतीत करून माणिकप्रभूंनी मार्गशीर्ष शु. ११, श. १७८७ या दिवशी जिवंत समाधी घेतली. त्यांच्या अवतारकार्यामुळे दत्त संप्रदायाच्या प्रसाराला आणि प्रगतीला फार मोठी गती मिळाली. समन्वयाच्या वृत्तींतून निर्माण झालेली दत्तदेवता जणू समन्वयाचे प्रात्यक्षिक आचरण्यासाठी या भूतळावर माणिक प्रभूंच्या रूपाने अवतरली .

श्रीप्रभूंनी पुष्कळ प्रवास केला व चमत्कार केले. मुधोळ गावच्या पहाडातील गुहेत ते समाधी लावून बसत असत. मुधोळ संस्थानात फिरत असता एकदा एका वडार्‍याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. श्रीप्रभूंनी आपल्या कृपाशीर्वादाने त्याचे प्राण वाचवले. एक ब्राह्मण कुटुंब श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी येत होते. वाटेत चोरांनी त्यांना लुटले. ते श्रीप्रभूंची प्रार्थना करू लागले. चोरांनी ब्राह्मणाला मारण्यासाठी शस्त्र उगारले. पण त्यांचे हात वरचे वर थिजले. चोरांनी श्रीप्रभूंची प्रार्थना केली. ते श्रीप्रभूंना शरण आले. नंतर त्यांचे हात मोकळे झाले. श्रीप्रभूंनी त्या ब्राह्मण कुटुंबाचे कोटकल्याण केले.श्रीप्रभु तेथे एका शिवालयात राहू लागले. सरकारी अधिकार्‍यांनी तेथे येऊन शिवालय व आजूबाजूची जागा स्वच्छ केली. श्रीप्रभूंच्या राहण्याची व्यवस्था केली. पाच दिवस मोठा समारंभ झाला. सरकारने कोठी लावून दिली. आलेल्या भक्तांची व्यवस्था केली. अशा रीतीने ‘माणिकनगर’ ची रचना झाली. कल्याणहून मातोश्री व तात्यासाहेब तेथे राहण्यासाठी आले, पण प्रभूंनी त्यांना परवानगी दिली नाही. आठवड्यातून फक्त एक दिवस शनिवारी किंवा गुरुवारी येण्याची आज्ञा दिली. इतर आंधळे, पांगळे, यात्रेकरु, सेवेकरिता राहिलेले रुग्ण यांची व्यवस्था भांडारखान्यातून केली. भक्तांनी श्रीप्रभूंची गादी स्थापन केली. भक्तांच्या आग्रहाखातर श्रीप्रभू त्या गादीवर बसू लागले. जवळच दत्तगादीही स्थापन केली होती. तेथेही नेहमी भजन, कीर्तन, प्रवचन होत असे.

श्रीप्रभूंच्या मनात कोणताही राजकीय हेतू नव्हता. त्यांच्या मनात केवळ परोपकार व दानधर्म करण्याचाच हेतू होता. वडील बंधू दादासाहेब व मातोश्री बयाबाई यांना निर्वाणाच्या वेळी ब्रह्मज्ञान दिले व त्यांना मुक्ती दिली. पुढे तात्यासाहेबांनी स्वत: गुरुचरित्राचे पारायण करून पुष्कळ दानधर्म केला. भजनपूजनादी सत्कर्मे करुन सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंच्या चरणावर मस्तक ठेवले आणि मग योगासन घालून समाधी घेतली. श्रीप्रभूंनी त्यांचे चिरंजीव अप्पासाहेबांकडून सर्व उत्तरविधी शास्त्रोक्त करविला व हजारो रुपये दानधर्म केला.

श्री समर्थ अक्कलकोट स्वामी एकदा प्रभूंच्या भेटीला आले. प्रभूंची व त्यांची एकांतात भेट झाली, चर्चा झाली. नंतर एकदा शृंगेरीचे जगद्गुरु श्रीशंकराचार्य श्रीप्रभूंच्या भेटीस आले होते. जगद्गुरूंना सिंहासनावर बसवून त्यांची तात्यासाहेबांकडून यथासांग पाद्यपूजा करवली. त्यांना वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे, पालख्या सर्व अर्पण केले. भोजनसमारंभही मोठ्या थाटाने झाला, त्यांना निरोप देताना श्रीप्रभू त्यांना पोहोचवण्यासाठी दोन कोसपर्यंत गेले होते.

यानंतर श्रीप्रभूंनी समाधी घेण्याचा निश्चय केला. समाधीचा दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा निश्चित केला. श्रीप्रभूंनी आपल्या तीन चार विश्वासू भक्तांना सांगितले की, समाधी घेतल्यानंतर चार दिवसांनी ही गोष्ट जाहीर करावी. कारण मुसलमान भक्त भावना विवश होऊन समाधीच्या कामात विघ्न आणतील. श्रीप्रभूंनी  तात्यासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र – मनोहरप्रभु कडून आपली पूजा करवून घेतली गळ्यात हार घातला आणि त्यांना आशीर्वाद दिला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सन १८६५ सद्गुरू श्रीमाणिकप्रभू समाधिस्थ झाले. ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ अशी सर्वांनी गर्जना केली व समाधी विवराला चिरा लावून समाधी विवर बंद केले. श्रीप्रभूंच्या विरहाने भक्तांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. नंतर चार दिवसांची श्रीप्रभूंच्या समाधीची गोष्ट प्रकट करण्यात आली व भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात आले. पुढे सोळाव्या दिवशी श्रीमनोहरप्रभूंना त्यांच्या गादीवर बसवले.

ईश्वरी तत्त्वासमोर पंथ-संप्रदाय, जातपात, भेदाभेद, मंगल-अमंगळ, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सर्व गोष्टी गौण आहेत हे सिद्ध करीत प्रभूंनी प्रमुख व प्रचलित धर्मातील जे जे उत्तम व उदात्त आहे त्यांचा स्वीकार करून त्यायोगे सकलमत संप्रदायाची स्थापना केली. ‘सकल’ म्हणजेच सर्वांच्या मतांना सामावून घेणारा संप्रदाय. कर्म, भक्ती, योग व ज्ञान या चारही मार्गांचा समुच्चय जिथे होतो असा हा संप्रदाय.माणिकप्रभूंचे ‘ऐश्वर्य’ हा त्या काळी सर्वसामान्यांनाच नव्हे, तर राज्यकर्त्यांनादेखील अचंबित करणारा विषय होता. प्रभूंच्या समग्र अवतारकार्यामध्ये सतत आणि सर्वत्र संपत्तीचा ‘ओघ’ अविरत वाहत असल्याची वर्णने वाचावयास मिळतात. सन १८५७ च्या बंडातील अग्रणी नानासाहेब पेशवे यांना देखील माणिकप्रभूंनी त्यांच्या एका भक्ताकरवी आर्थिक मदत केल्याची घटना विदित आहे.

प्रभूंचे आगमन जिथे होत असे अथवा जिथे त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होत असे तेथील वातावरण ‘नित्यश्री नित्य मंगल’असे. प्रभूंचे आगमन झाले म्हणजे भक्तांची गर्दी उसळत असे. बाप्पाचार्य लिखित ‘माणिकप्रभाकर’ तसेच रामचंद्रबुवा सोलापूरकर-जीवनदास-गणेश टोळे यांनी लिहिलेल्या तत्कालीन ‘श्रीप्रभूचरित्रां’मध्ये वरील वर्णने तपशीलवार आली आहेत. राजेमहाराजांपासून अमीर-उमराव-अंमलदारांपर्यंत बडय़ा हस्ती प्रभूंसमोर नतमस्तक होत असत. प्रभुदर्शनासाठी तिष्ठत राहणाऱयांमध्ये अनेक बडे सरदार आणि धनवंतांचा समावेश असे. या धनिकांकडून प्रभूंसमोर दानस्वरूपात जी संपत्ती येत असे त्या सर्व संपत्तीचा विनियोग प्रभुदरबारात गोरगरीब आणि अडलेल्या-नाडलेल्या लोकांसाठी केला जात असे. दीनदुबळ्यांस आधार, निर्धनास धन, भुकेलेल्यास अन्न आणि ज्ञानार्थीयांस ज्ञान या रीतीने ज्याला जे हवे ते देण्याची ताकद प्रभूंच्या विशाल अंतःकरणात होती. असे असले तरीही ऐश्वर्य ल्यायलेला हा सत्पुरुष स्वतः मागून आणलेल्या ‘भिक्षेच्या झोळीत’ जे काही मिळेल त्यावर गुजराण करीत असे. लसणाची चटणी आणि भाकर हा त्याच्या तृप्ततेचा परमावधी होता. कुबेरासही हेवा वाटावा अशी श्रीमंती वागविणारा हा उपभोगशून्य स्वामी अंतर्यामी अतिशय विरक्त आणि अनासक्त होता. साक्षात निर्विकल्प, निर्विकार, निर्लोभी या शब्दांना अर्थ प्राप्त व्हावा इतकी विरक्तता प्रभूंमध्ये नित्य वास्तव्यास आली होती.

प्रभूंचे अवतारकार्य परमोच्च स्थानी बहरले असताना महाराष्ट्रामध्ये श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट) श्रीदेवमामलेदार (सटाणा), श्रीअण्णाबुवा (मिरज), श्रीकृष्णसरस्वती (कोल्हापूर), श्रीधोंडीबुवा (पळूस) आपापल्या प्रांतात स्थिरस्थावर होते आणि श्रीगजानन महाराज (शेगाव), श्रीपंत महाराज (बाळेकुंद्री), श्रीटेंबेस्वामी, श्रीबीडकर महाराज आदी सत्पुरुषांचे अवतारकार्य घडू पाहत होते. शिर्डीकर बाबासाई आणि ‘ब्रह्मचैतन्य’ गोंदवलेकर या दोघांनाही त्यांच्या कुमारवयात श्रीमाणिकप्रभूंचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. प्रभूंनी समाधीत प्रवेश केल्यानंतर अनेक सत्पुरुष अवतरले अन् स्थिरावले असले तरीही अवधूत संप्रदायाचे स्वरूप तथा आध्यात्मिक वैभव प्रभूंनी दिमाखाने पुढे आणले.

संतसत्पुरुषांच्या ठायी असलेले दैवी सामर्थ्य, त्यांचे विचार-शिकवण, तसेच त्यांचे लीला-चमत्कार बहुतकरून सारखेच असतात. मात्र त्यांनी स्वीकारलेल्या अध्यात्ममार्गातून त्यांच्यातील वेगळेपण जाणवते. सत्पुरुषांठायी सदैव जागृत असणारं अलौकिक तत्त्व आणि मानवी देह धारण केल्यामुळे येणाऱया मर्यादा माणिकप्रभूंमध्येही दिसणे स्वाभाविक होते. तरीही त्यांचे अवतारकार्य संतमांदियाळीमध्ये उठून दिसते ते ‘सकलमतसंप्रदाय’ स्थापनेतून. ‘सकल’ म्हणजेच सर्वांच्या मतांना सामावून घेणारा संप्रदाय. कर्म, भक्ती, योग व ज्ञान या चारही मार्गांचा समुच्चय जिथे होतो असा हा संप्रदाय. ‘श्रुतीधर्म रक्षुनी सकल मतांते वंदा। सर्वांतरी आत्मा नको कुणाची निंदा।’ असा उत्तुंग आशावाद प्रकट करणारा संप्रदाय प्रभूंनी निर्माण केला. ईश्वरी तत्त्वासमोर पंथ-संप्रदाय, जातपात, भेदाभेद, मंगल-अमंगळ, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सर्व गोष्टी गौण आहेत हे सिद्ध करीत प्रभूंनी प्रमुख व प्रचलित धर्मातील जे जे उत्तम व उदात्त आहे त्यांचा स्वीकार करून त्यायोगे सकलमत संप्रदायाची स्थापना केली.

श्रीदत्तात्रेय हे श्रीमाणिकप्रभूंचे आराध्य दैवत. श्रीदत्ताने बऱयावाईटाची सांगड घालून अनेकविध गुरू केले, त्याच धर्तीवर श्रीमाणिकप्रभूंनी सकलमत संप्रदायाची स्थापना केली. मधमाशी ज्या सापेक्षतेने अनेकविध फुलांतील मध गोळा करते त्याच पद्धतीने सर्व संप्रदायांतील उत्तमोत्तम गोष्टींचा स्वीकार करून सकलमत संप्रदायाची ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली. श्रीदत्त आणि मधुमती शक्ती यांना प्रमाण मानून सकलमत संप्रदायाची गादी स्थापन करताना प्रभूंनी त्यावर विशिष्ट देवतेची स्थापना न करता चैतन्यदेवाची स्थापना केली. हा चैतन्यदेव म्हणजे प्रत्यक्ष सगुण स्वरूपातील दैवत नसून तुमच्या-आमच्या आणि प्रत्येकाच्याच मनातील आराध्य देवतेचे चैतन्य आहे. प्रभूंच्या समाधीच्या मागील बाजूस चैतन्यदेवाची गादी स्थापन करण्यात आली आहे. प्रभू समाधीचे दर्शन घेताना आपणांस आपल्या आराध्य दैवतास त्या गादीवर स्थानापन्न करू देण्याइतका ‘उदार’मतवाद हे सकलमत संप्रदायाचे वैशिष्टय़ आहे.

प्रभूंच्या या सर्वसमावेशक संप्रदायाची धुरा पुढे त्यांचे पुतणे श्रीमनोहरप्रभू व श्रीमार्तंडप्रभू या सत्पुरुषांनी चालविली. त्यांच्या पश्चात या संप्रदायाला श्रीशंकरप्रभू व श्रीसिद्धराज प्रभू यांनी जोपासले आणि वृद्धिंगत केले. सध्या ‘सकलमताचार्य’ म्हणून श्रीज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांच्या खांद्यावर सकलमत संप्रदायाची धुरा आहे. श्रीमार्तंड माणिकप्रभूलिखित ‘ज्ञानमार्तंड’ हा संप्रदायाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे.

येणाऱया प्रत्येक भक्ताला ‘माऊली’ रूपाने स्वीकारून, समानतेचा पुरस्कार करून, जगताला स्वतःचा संसार मानून, वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी संजीवन समाधीमध्ये प्रवेश करणाऱया या अलौकिक सत्पुरुषाचा विरह सहन न झाल्यामुळे शेकडो भक्तांनी स्वतःच्या छातीत सुरे खुपसून घेतले. दुःखातिरेकाचा आवेग सहन न झाल्यामुळे शेकडोंनी आत्मघात केला. कित्येकांनी आपली डोकी रक्तबंबाळ होईतोवर भिंतीवर आपटून घेतली. अशा त्या कनवाळू सत्पुरुषाबद्दल किती लिहावं हा प्रश्न आहे. भक्तांच्या प्रपंचासाठी परमार्थाचे शिंपण घालणारा श्रीमाणिकप्रभू नावाचा ‘अवलिया’ प्रातःस्मरणीय आणि वंदनीय होता, आहे आणि यापुढेही नित्य राहील.

                                                                       ||‘जय गुरू माणिक’ ||

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/feed/ 0
सज्जनगड https://www.sadguruvani.in/%e0%a4%b8%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a1-3/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%b8%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a1-3/#respond Sun, 21 Jan 2024 05:53:33 +0000 https://www.sadguruvani.in/?p=33

                     || श्री राम समर्थ || 

गडावर असलेले समर्थांचे समाधी मंदीर सुद्धा पाहिले असेल आणि त्यांचा राहता वाडा किंवा मठ तो देखील पाहिला असेल. छत्रपती संभाजी महाराजांनी केवळ पावणे दोन महिन्यांमध्ये बांधलेल्या ह्या मंदिरामध्येच वरच्या बाजूला प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत, परंतु हे मंदिर ही गडावरची सगळ्यात जुनी वास्तू नाही. तर शिवछत्रपतींनी स्वतःच्या निवासासाठी बांधलेला वाडा ही गडावरची सर्वात जुनी वास्तू आहे. #समर्थांनी आपल्या आयुष्यातला अखेरचा महत्त्वाचा काळ सज्जनगडा वरती व्यतीत केला आणि तशी त्यांना शिवछत्रपतिँनीच विनंती केली होती हे आपण जाणतो. परंतु आपल्या राहत्या वाड्यामध्ये समर्थांना मुक्कामास ठेवून घेतलेल्या शिवछत्रपतींनी गडावरती आल्यावर जेव्हा वाड्या शेजारी असलेला मोठा खड्डा पाहिला, तेव्हा त्यांनी तो खड्डा बुजवून टाकण्याची आज्ञा मावळ्यांना दिली. त्यावर श्री समर्थांनी शिवरायांना विनंती केली की कृपया तो खड्डा बुजवून नये कारण पुढे त्याचा मोठा उपयोग व्हावयाचा आहे. समर्थांनी संपूर्ण भारतभरात मठस्थापना केली हे तर आपण जाणतोच त्यातील बरेचसे मठ आजच्या तमिळनाडू राज्यामध्ये आहेत. तमिळनाडूमध्ये अरणी नावाचे एक गाव आहे. येथील हातमागावर विणलेल्या आणि अक्षरशः काडीपेटी मध्ये बसेल इतकी छोटी घडी होणाऱ्या आरणी च्या रेशमी साड्या माता-भगिनींना सुपरिचित असतीलच. तेच हे अरणी गांव जिथे समर्थांचे नेहमी येणे जाणे असे. हे ठिकाण तंजावर पासून तसे जवळ आहे. तंजावर मध्ये समर्थांचे आजही सात मठ कार्यरत आहेत, असो. तर या अरणी गावांमध्ये पितळयापासून किंवा पंचधातू पासून देवदेवतांच्या अत्यंत सुंदर मूर्ती घडविणारे अनेक कारागीर परंपरागत राहत आहेत .आजही आहेत. गुणग्राहकतेचा सदैव ध्यास असलेल्या समर्थांना निश्चितच असे वेड लागले की या सर्व मूर्ती कारांमध्ये सर्वात उत्कृष्ट कला अंगी असलेला मनुष्य कोण असेल ? तेव्हा त्यांना असे कळले की असा एक वृद्ध कारागीर तिथे आहे परंतु मूर्ती करताना उडणारे धातूचे कण डोळ्यामध्ये गेल्यामुळे त्याची दृष्टी अधू झालेली आहे त्याला अजिबात दिसत नाही त्यामुळे आता त्याने मूर्तिकला थांबविली आहे. समर्थांना खूप वाईट वाटले आणि त्या वृद्ध कारागिराने आयुष्यभर केलेल्या परमेश्वराच्या सेवेचे फळ म्हणून की काय साक्षात समर्थ त्यांच्या दारात जाऊन हजर राहिले. समर्थ त्या कारागिराला म्हणाले की मला माझ्या नित्य पूजेसाठी रामाचे पंचायतन बनवून हवे आहे आणि ते तुमच्या हातूनच बनविले पाहिजे असा माझा अट्टाहास आहे. वृद्ध कारागीर रडू लागला . त्याने समर्थांना सांगितले की हे साधू मला आता दृष्टी उरलेली नाही त्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नाही. यावर समर्थांनी त्या कारागिराला जे उत्तर दिले ते अक्षरशः हृदयात कोरून ठेवण्या सारखे आहे.* समर्थ त्याला म्हणाले , “अरे बाबा माझ्या प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी या चर्मचक्षूंची अजिबात आवश्यकता नाही. तो आत्माराम तर तुझ्या माझ्या अंतरंगात वास करतो आहे .त्याचे दर्शन आपल्याला आपल्या अंत:चक्षूंनी सुद्धा होऊ शकते.* आणि बहुतेक रामरायाची अशी इच्छा दिसते की तुझ्या हातूनच पुन्हा प्रकट व्हावे त्यामुळे तुच त्या मूर्ती घडविणार आहेस. ” असे म्हणत समर्थांनी त्या कारागिराच्या डोक्यावरती हात ठेवला आणि पाहता पाहता त्याचे देहभान हरपले त्याच्यासमोर तेजाचा एक मोठा झोत दिसू लागला ! पाहता पाहता त्या तेजाच्या गोळ्याचे रूपांतरण प्रभू रामचंद्रांच्या अत्यंत सुंदर मनोहरी अशा मूर्ती मध्ये झाले ! साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्या कारागिराला दर्शन दिले ! तो अक्षरशः कृतकृत्य झाला !* समर्थांच्या भेटीने त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्याने विना विलंब अत्यंत सुंदर अशा प्रभू रामचंद्र ,श्री सीतामाई ,श्री लक्ष्मण आणि समोर उभा ठाकलेला दासमारुती, अशा अप्रतिम मूर्ती हातोहात घडविल्या. त्या मूर्ती पाहून समर्थ अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या कारागिराला विचारले की तुला काय हवे ते माग, त्यावर आरणीकर त्यांना म्हणाला समर्थ आपले दर्शन जाहले ,साक्षात प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले !या डोळ्यांनी आता अन्य काही पहायची इच्छा उरलेलीच नाही. त्यामुळे माझी दृष्टी पूर्ववत आंधळी करून टाकावी इतकीच आपल्याला प्रार्थना आहे ,म्हणजे सतत त्या आत्मारामाच्या चिंतनात उरलेला काळ व्यतीत करता येईल ! समर्थांनी त्याची दृष्टी काही घालविली नाही परंतु सतत त्या आत्मारामाचे दर्शन घडेल अशी आत्म दृष्टी त्याला देऊ केली. अनुग्रह देऊ केला.आणि भरभरून आशीर्वाद दिले. समर्थ गडावरती आले. त्या मूर्ती आज आपण ज्याला समर्थांचे शेजघर म्हणतो त्याचे घरामध्ये ४ दिवस त्यांनी पुजल्या (माघ वाद्य पंचमी रोजी मूर्ती गडावर पोहोचल्या ) *आजही त्या खोलीमध्ये राम मूर्तींचा ओटा म्हणून चंदनाची अत्यंत सुबक कलाकुसर असलेला एक लाकडी ओटा ठेवलेला आहे पहा त्यावरती त्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. पंधराव्या दिवशी समर्थ आपल्या आसनावरून खाली जमिनीवरती येऊन बसले, पद्मासन लावले ,दृष्टी नासाग्र स्थिर झाली ,डोळे मिटले .त्रिवार रामरायाचा जयजयकार केला आणि त्यांच्या देहातून प्राणज्योती चा मोठा लोळा बाहेर पडून तो थेट त्या रामाच्या मूर्तींमध्ये प्रवेश करता झाला हे सर्व उपस्थित शिष्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तो दिवस होता माघ वद्य नवमी चा. *#ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळताच ते जातीने सज्जनगडा वरती उपस्थित झाले आणि मठाच्या शेजारी जो मोठा खड्डा होता तिथेच समर्थांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले. दुसर्‍या दिवशी त्या चितेच्या स्थानी एक स्वयंभू समाधी प्रकट झाली. त्याच समाधी वरती पावणे दोन महिन्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत सुबक असे समाधी मंदिर बांधले व #समाधीच्या बरोबर वरच्या बाजूला प्रभुरामचंद्रांचा ह्याच मूर्तींची स्थापना करण्यात आली. स्वतः समर्थांचे प्राण या मूर्तीमध्ये प्रविष्ट झालेले असल्यामुळे त्या मूर्तींची वेगळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली नाही. असे कदाचित भारतातील हे एकमेव मंदिर असावे. त्यामुळेच ह्या मूर्ती वर्षातून पाच वेळा जागेवरून हलविल्या जातात व बाहेर अंगणामध्ये आणून स्वच्छ धुतल्या जातात जी सेवा कोणालाही मिळू शकते. या विधीला उद्वार्चन असे म्हणतात. आपण ह्या मूर्तीचे नीट निरीक्षण केले असता आपल्याला असे लक्षात येईल की आरणीकराने रामरायाला डोळे तेवढे काढलेले नाहीत. एका अंध कारागिराने केलेल्या मूर्तीची ओळख म्हणून आजही ती कायम राहिलेली आहे ! प्रभू रामचंद्राच्या या मूर्तीचे जर आपण निरीक्षण करत राहिलो तर तासनतास त्या मूर्तीकडे पहातच रहावेसे वाटते इतकी ती सुंदर आहे कारण ती साक्षात प्रभू रामचंद्राला समोर उभे करून बनविण्यात आलेली आहे ! अशा या सुंदर मूर्तीचे दर्शन आपण पूर्वी घेतले असेल तर आपण भाग्यवान आहातच परंतु जर अजून घेतले नसेल तर एकवार अवश्य सज्जनगडावर जाऊन ह्या मूर्तीचे अवलोकन करावे आणि या आयुष्यामध्ये धन्यता कशाला म्हणतात त्याचा अनुभव घ्यावा ! जय जय रघुवीर समर्थ !

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%b8%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a1-3/feed/ 0
श्रीधरस्वामी जन्म कथा https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be/#respond Sun, 21 Jan 2024 05:52:05 +0000 https://www.sadguruvani.in/?p=31

                                                                            || श्री राम समर्थ || 

हाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात देगलूर म्हणून एक प्रसिद्ध गाव आहे. येथील धुंडा महाराज देगलूरकर एक प्रसिद्ध धर्मपरायण, हरिपरायण व्यक्तिमत्व होऊन गेले आहे. त्याच्या भक्तिपरायणाने त्यांच्या पूर्ण वंशच हरिभक्तीला वाहिलेला आहे. हा एक वंशपरंपरागत चाललेल्या भक्तीचे. एक आदर्श उदाहरण म्हणायला पाहिजे. तसे देगलूर हे संपूर्ण गावच भक्ति मार्गाकडे आकर्षित असल्याचे दिसून येते. नांदेड जिल्ह्यापासून ८० मैल दक्षिणेकडे, किंवा हैद्राबादपासून जवळपास २०० किमी. वर हे गाव आहे. या देगलूर गावात पत्कींचा वाडा फार जुना असून लोक बाहेरगावच्या पाहुण्यांना हा वाडा म्हणजे एक प्राचीन ऐतिहासिक वास्तू म्हणून दाखवित असतात. देगलूर शहराच्या मध्यभागी श्रीरामचंद्राचे व श्रीविठ्ठलाचे अशी दोन मंदिरे आहेत. अर्थातच ही देगलूरकर वासियांची श्रद्धास्थाने, नित्य दर्शन, उपासनेची स्थाने आहेत. त्यामुळे येथील लोक श्रीरामाचे किंवा श्रीविठ्ठलाचे भक्त निपजतील यात शंका नाही. श्रीधुंडा महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायाचे तर श्रीधरस्वामी हे रामदासी संप्रदायाचे होते.

हे दोघेही मूळचे देगलूर गावचे राहणारे होते. नारायणराव व गोविंदराव देगलूरकर हे दोघे सख्खे भाऊ पुढे काकांच्या त्रासानी हैद्राबादला येऊन स्थाईक झालेत. यांचे वास्तव्य पत्कींच्या जुन्या वाड्यातच असावे. आडनावाचा उल्लेख कोणीही लेखकानी अधिकाराने केलेला नाही. यांच्या वडिलांचे नाव तिरमाजी व आजोबांचे नाव शिरमाजी असल्याचा उल्लेख चरित्र लेखक श्री. मारुतीबुवा रामदासी यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. श्रीधरस्वामींच्या कुळात अपत्यांचा अभाव होता. त्यांना वाडवडिलांकडून वैभव, ऐश्वर्य मिळाले होते. पण ते टिकले नाही असेच म्हणावे लागेल. त्यांच्या घराण्याला नागाचा शाप असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पत्की वाड्याच्या घरात एक मोठा नाग निघाल्याचे सांगतात. त्याला मारण्याकरिता वाड्यातील मंडळी लाठी, काठ्या बंदुका घेऊन जमा नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे ।

झाली होती. नाग फणा काढून डुलत होता. सर्वत्र लोकांकडे पाहत होता. काहींनी तो घराण्याचा रक्षक आहे. निघून जाईल मारू नका असे सांगितले तर काहींनी. हा नाग हा विषारी आहे. कोणाला चावला तर मृत्यू येईल. शिवाय घरात नाग असताना राहायचे कसे ? भीतीनेच माणूस अर्धमेला होईल. शेवटी त्यांच्या घराण्यातील कोणी तरी बंदुकीची गोळी चालवून- नागाला जागीच ठार मारले. पण काही दिवसांनी श्रीधरस्वामींच्या घराण्यातील पूर्वजांच्या स्वप्नात एका तेजस्वी पुरुषाने येऊन सांगितले की मी तुमच्या घराण्यातील कर्ता पुरुष, रक्षक होतो. तुम्ही मला ठार मारलेत. त्याचा शाप म्हणजे तुमचे घराणे निर्वंश होईल. हे ऐकून तो पूर्वज स्वप्नातच कासावीस झाला. घराणे तर वाचवायला पाहिजे. म्हणून त्या तेज:पुंज पुरुषाची प्रार्थना करू लागला की एवढी मोठी शिक्षा संपूर्ण घराण्याला देऊ नका. ज्यानी वध केला त्याला द्या. इतरांना त्या ब्रह्महत्येचे पाप कशाला देता. तेव्हा त्याची प्रार्थना ऐकून त्या तेज:पुंज पुरुषाने उःशाप दिला की या कुळाला उद्धरणारा एक संन्यासी जन्माला येईल. तुमच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होईल पण वंश खुंटेल. अशी शापवाणी व उःशाप देऊन तो पुरुष अदृश्य झाला.

ही घटना श्रीधरस्वामींच्या घराण्यात घडलेली आहे असा उल्लेख अनेक चरित्रलेखनकर्त्यांनी केला आहे. कर्माची गति किती गहन असते. आपल्याला त्याचे आकलन येत नाही. श्रीशंकराचार्य म्हणतात कर्म करून कोट्यानुकोटी वर्षे झाली तरी त्याचे फळ हे भोगावेच लागते. ते कोणत्या जन्मात, कोणत्या योनीत भोगावे लागेल हे मात्र सांगता येत नाही. रामायणातील कथा घेतली तर तुम्हाला माहित आहे की दशरथ राजाकडून नकळत श्रावणबाळाला बाण लागून मृत्यू आला होता. त्याच्या आईवडिलांनी राजा दशरथाला शाप दिला होता की तू देखील पुत्रविरहाच्या दुःखाने विव्हळ होऊन मृत्युमुखी पडशील. तेव्हा दशरथाला मूलबाळ नव्हते. त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्यानंतर त्याला चार पुत्र प्राप्त झाले. रामाला वनवासात पाठविताना त्याला अपार दुःख झाले व त्याला मृत्यू आला. येथे दशरथाचे संचित कर्माची फळे त्याला पुत्रप्राप्तीनंतर भोगावी लागली. तसेच श्रीधरस्वामींच्या कुळातील घडलेल्या घटनेची, दुष्कर्माची फळे त्यापुढील वंशावळीला भोगावी लागली.

नारायण व गोविंद यांचे बालपण त्याच्या काकाकडे गेले. कारण ही मुले अल्पवयात असताना मातापित्याचे छत्र उडून गेले होते. त्याचे काका खूपच खाष्ट, तामसी वृत्तीचे असल्याने त्यांनी पुतण्याचा सांभाळ, योग्य प्रकारे केला नाही. त्यांना शिक्षण पण दिले नाही. उलट लोकांसमोर ही कारटी/कधी तोंड काळी करतील हे सांगता येत नाही. नुसती. घोड्यासारखी वाढत आहेत. अशी टीका, तीक्ष्ण वाक्ये बोलून ते पुतण्यांची निर्भत्सना करायचे. अशा घरात काय रहायचे? या विचारांनी दोन्ही भाऊ देगलूरहून निघून हैद्राबादेत आलेत. तेथेही त्यांना दुःखाची झळ सोसावी लागली. मोठ्या प्रयत्नांनी एका श्रीमंत व्यक्तीची प्रार्थना करून त्यांनी नोकरी मिळविली. नोकरी म्हणजे कष्टाची कामे दिवसभर करायची दोन वेळ जेवून रात्री पडायचे. घर सोडले, गाव सोडले तरी दारीद्र्य काही कमी झाले नाही. काळाची प्रतिकूलता, अनुकूलता यावरच प्रारब्ध भोगावे लागते. हा काळ म्हणजे परमात्म्याचे दुसरे रूप आहे. एक सर्व विश्वाचे लालन पालन पोषण करणारी विष्णूची मूर्ती आणि काळाचा प्रताप दाखविणारी प्रलयाची भयावह मूर्ती. हेच विश्वरूप ज्ञानदेव माऊलीने अध्याय १० मध्ये वर्णन केले आहे. १०.१५ ते १०.२२ मध्ये विश्वरूप सुखावह, आनंददायी आहे. तर १०.२३ ते ३० मध्ये संहार करणारे काळभैरवाचे रूप आहे. परब्रह्माची ही दोन्ही रूपे पाहावीत त्यानंतर संपूर्ण ब्रह्माचे रूप दर्शन होते.

दोन्ही भावांची शिक्षणाची आवड पाहून त्या श्रीमंत गृहस्थाने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. थोडे सुखाचे दिवस पाहता न पाहता तोच दोघांच्या बायका एकामागे एक इहलोक सोडून गेल्या. पुन्हा दुःखाची लाट जीवननौकेवर आदळू लागली. त्यांनी दुसरे लग्न करून पुन्हा संसार करायचे ठरविले. गोविंदरावांना पहिल्या व दुसऱ्या पत्नीकडून अपत्य नव्हते. नारायणरावांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी s रेणुका (गोदावरी) होती. व दुसरी पासून गोविंद हे दोन मुलगे. त्यातील गोविंदाने मृत्यू गाठला. त्यामुळे घरावर काही सावट, अरिष्ट दाखवून  असल्याचे नारायणरावांच्या पत्नीला वाटायला लागले, तिला पुन्हा पुन्हा नागाच्या शापाची भीती वाटायची. ब्राह्मणाला, उपाध्यायांना भेटून जन्मपत्रिका काही तोडगा निघतो का ? असे कमळाबाईंनी ठरविले. पत्रिकेनुसार तुम्हाला गाणगापूरला जावे लागेल. तेथे नारायणराव व कमळाबाईनी तप, व्रत करावीत. श्रीगुरु नृसिंहसरस्वतींच्या कृपेने तुम्हाला एक दिव्य रत्न प्राप्त होईल. हा ब्रह्मसंन्यासी तुमच्या घराण्याला असलेल्या शापाचे उच्चाटन करून पुन्हा नाव लौकिक वाढवेल. अशी भविष्यवाणी ऐकून नारायण व कमळाबाईने. हैद्राबादहून गाणगापूर गाठले. लवकरच गाणगापूरला आल्यावर नारायणराव व कमळाबाईनी मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने श्रीगुरुचरित्र पारायण सुरू केले. ती रात्रंदिवस गुरुसेवा व पतिसेवेत रमून जाई. तिला स्वतःचे देहभान पण राहत नव्हते. श्रीदत्तात्रेयांनी तिची भक्ती पाहून प्रसन्न होऊन प्रसाद म्हणून एक श्रीफळ दिले. पतिपत्नीनी तो प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर कमळाबाईंना दिवस गेले. मुलीच्या बाळंतपणासाठी आई बयाबाई, चिंचोलीला येऊन राहिली. चिंचोलीला कमळाबाईची एक मानलेली बहीण होती. पण संबंध घरोब्याचे होते. बाळंतपण चिंचोलीला करायचे ठरले. चिंचोली हे गाव गाणगापूर पासून दहाबार किमीवर आहे. चिंचोलीचे ग्रामस्थ दत्तात्रेयाला ग्रामदैवत मानून दत्तजयंती साजरी करायची. अशाच एका दत्तजयंतीला कमळाबाईंनी श्रीधर बाळाला जन्म दिला. श्रीधर स्वामींचा जन्म सन १९०८ दत्तजयंतीच्या दिवशीचा. जन्मस्थळ लाडचिंचोली. दत्तकृपेने पुत्रलाभ झाला हे पाहून सर्वांनाच अतिशय आनंद झाला. कमळाबाईचा आनंद तर गगनात मावेनासा होता. त्यावेळेस थोरल्या भाऊ अंबकचे वय बारा वर्षाचे तर रेणुका (गोदावरीचे) वय २५-२६ वर्ष वयाचे होते. त्यावेळेस गोदावरीचे लग्न होऊन ती सासरी गेली. श्रीधरस्वामींच्या जन्मानंतर त्याचे वडिल नारायणरावांचे निधन झाले. त्यांचे वय पन्नाशीच्या जवळपास असावे. पतिदेवाचे निधन हा एक मोठा घातच कमळाबाईवर होता. पण श्रीधरबाळाला मोठे करायचे आहे ही जबाबदारी त्यांचेवर होती. श्रीधरबाळाचे गोड हास्य पाहून ती दुःख विसरून जबाबदारीने वागत असे. श्रीधरला हैद्राबादच्या विवेकवर्धिनी शाळेत घातले. तो हुशार, एकपाठी असल्याने तो पहिला नंबर सहजच पटकावयचा. आई त्याला रामायणातील कथा गोष्टी सांगायची. हनुमानाने रामनाम घेऊन किती असाध्य कामे साध्य केली. हे ऐकून श्रीधरस्वामींची श्रद्धा रामनामावर दृढ होत गेली. त्यांना रामनामाची गोडी लागली. त्या गावात नारायणमहाराजांचा मठ होता. श्रीधर आईबरोबर नेहमी मठात जाई. तेथे श्रीसमर्थ रामदास स्वामींचे मोठे तैलचित्र होते. त्या चित्रासमोर श्रीधर तासन्तास उभा राहून रामनाम म्हणत राहायचा. हा दृश्याचा प्रभाव आहे. फोटोतून सद्गुरु कशी कृपा करतात ती कृपा श्रीधरस्वामींवर बालपणातच झाली. तेथे खैरताबादचा केसरी मारुती होता. जवळपास ७-८ किमी दूर होता. श्रीधर स्वामी रोज मारूती दर्शनाला जाऊन परत येत. हे मारूतीचे देऊळ हैद्राबादच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. कमळाबाईंनी श्रीधराचा मौज गाणगापूरला केली. औदुंबरच्या वृक्षाखाली त्यांना श्रीदत्ताचा वैराग्याचा आशिर्वाद लाभला. श्रीधर स्वामी अवघे दहावर्षाचे असताना त्याचा भाऊ अंबक काळाने हिरावून नेला. त्यानंतर गोदुअक्का ही गेली. अशा दुखद प्रसंगी श्रीधरबाळाने आईला खूप सावरले. आई तू का रडतेस ? आपला देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. पण त्यात राहणारा आत्मा हा अजन्म, अमर आहे. नाशिवंत देहासाठी दुःख शोक व्यक्त करू नये. हे लहानपणाचे शब्द म्हणजे गीतेतील श्रीकृष्णाने अर्जुनाला जसे समजाविले होते. तसेच समजाविण्यासारखे आहे. इतक्या लहान वयात ज्ञान होणे हे त्यांचे साधुसंतांचे लक्षण दाखविते. त्यानंतर कमळाबाईंची हिम्मत खचल्यासारखी झाली. मुलगा- मुलगी मोठी कर्तीसवरती निघून गेल्यानी त्या खचत चालल्या होत्या. त्यांना बोलताना दम लागत होता. • श्रीधर बाळाला शेवटचा उपदेश दिला की सर्व स्त्रियांना तू मातेसमान मान, समाजाची, गुरुजनांची सेवाकर, स्त्रीजनांची सेवा करून त्यांचा उद्धार कर. सर्वांना समदृष्टीने पाहा. भेदभाव करू नकोस. बोलताना त्या मधेमधे थांबत होत्या. श्रीधरस्वामींच्या पाठीवरून हात फिरवला. मी सांगितलेले पाळ. अवज्ञा करू नकोस. असे म्हणून त्या शांत झाल्या. आईचे निधन वाल्यावर श्रीधर पोरका झाला.जवळचे आप्तेष्ट म्हणून कोणी उरलेच नव्हते. श्रीधरांनी काही दिवस त्याचा भाचा म्हणजे रेणुकेचा मुलगा दत्तात्रय कमलापुरकर यांचेकडे चिंचोळीलाच काढले. चुलत काकी त्रिवेणीबाईकडेही त्यांनी काही दिवस काढले. मावशीने श्रीधरला गुलबर्ग्याला बोलावून घेतले. हैद्राबादचे घर सोडून, सामान जोरगरिबांना वाटून फक्त मोजकेच सामान घेऊन श्रीधर स्वामी गुलबर्ग्याला गेले. तेथे त्यांना काही विद्वान लोकांची प्रवचने ऐकायला मिळाती, त्यात पुण्याचे अग्निहोत्री राजवाडे, ह.भ.प. ल. रा. पांगारकर, नारायणशास्त्री मराठे व ब्रह्मीभूत केवलानंद सरस्वती ही मंडळी सामील होती. हा एक प्रकारे सत्संगव घडत होता. श्रीधरांचे मन अध्यात्मशास्त्राकडे वळत होते. पण गुलबऱ्यात राहून प्रगती होणार नाही म्हणून त्यांच्या मनात पुण्याला जायचा विचार आला. पुण्यात शिकताही येईल व आपल्याला पाहिजे ती संगत पण मिळेल. पण पुण्यात राहायचे कोठे ? हा मोठा प्रश्न होता. गुलबर्म्यातील श्री. चितळे यांनी त्यांचा प्रश्न सोडविला. त्यानी एक चिठ्ठी कै. वि. रा. केतकर संचालक व संस्थापक पुणे अनाथ विद्यार्थीगृह यांना लिहून श्रीधराला त्यांना भेटायला सांगितले. ती चिठ्ठी घेऊन श्रीधर पुण्यात आले. अनाथ विद्यार्थी गृहात राहिले. तेथील काही वाटून दिलेली कामे करायची, आजारी लोकांची सेवा करायची, फावल्या वेळात अभ्यास, व्यायाम करायचा. सर्वांशी प्रेमळ संबंध ठेवल्याने ते सर्वांचेच आवडते होते. पुढे विद्यार्थीगृह सोडून नरसोबाच्या देवळात रहायला लागले. भावे स्कूल मध्ये इयत्ता सहावीत प्रवेश घेतला. वडिलांनी दिलेली ठेवीवर ते व्याज घेऊन खर्च चालवित. भिक्षा मागूनच ते उदरनिर्वाह करीत. अंगी वैराय बाणण्याकरिता त्यांनी गोड खाणे सोडले. त्यांना पेढे फार आवडायचे. पण त्याचा त्याग करून जिव्हेवर ताबा मिळविला. पैशाचा मोह नको म्हणून ते पैसे फेकून देत. जीवनाचे ध्येय सात्विक व उंच असावे. या उद्देशांनी त्यांनी तप, तपश्चर्या करायचे ठरविले. ते गोमेय- मृत्तिकास्नान त्रिकाळ करीत असत. त्यांची गाठ एकदा श्री. वा. दा. पळणीटकर यांचेशी पडली. श्री. पळणीटकर हे ब्रह्मचारी असून, सरळ स्वभावाचे, धर्मपरायण होते. त्यांनी श्रीधरमधील सत्वगुणी व्यक्तिमत्व व परमेश्वराचा ध्यास लागल्याचे ओळखले. श्रीधरच्या खोलीवर जाऊन त्यांनी सखोल चर्चा केली. रघुवीर समर्थ मनात काय आहे हे जाणून घेतले. तपासाठी सज्जनगड हे योग्य ठिकाण असल्याचे सांगितले. शिवाय तेथे श्रीसमर्थ रामदासस्वामींची समाधी आहे. त्याशिवाय उत्कृष्ट ठिकाण दुसरे नाही. त्यांनी श्रीधराला काही दिवस आपल्या खोलीत राहावयास बोलाविले. तेथे नित्य सायंकाळी श्रीमत् दासबोधाचे पठण होत असे. श्री. पळणीटकरांना पत्रिका पाहून, हस्तरेखापाहून भविष्य सांगण्याचा नाद होता. त्यांनी श्रीधरचा हात पाहून त्याचेकडून मोठे कार्य होणार आहे हे ताडले होते. सज्जनगडावर जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्लाही याकारणामुळे दिला होता. सद्गुरु जरी नसले तरी त्यांचा फोटो समोर ठेवून पूजा करून त्यांच्या मंत्राचा अनुग्रह घ्यावा. त्याप्रमाणे श्रीधरने समर्थ रामदासांचा फोटो समोर ठेवून पूजा करून, त्रयोदशीमंत्राचा तीनदा उच्चार करून फोटो कानाला लावला. त्यादिवसापासून श्रीरामदासस्वामी त्यांचे सद्गुरु झाले. सद्गुरु कानमंत्र देऊन दिक्षा अनुग्रह देतात पण सद्गुरु हयात नसल्याने असा अनुग्रह फोटो समोर ठेवून घ्यावा. दासबोध पथक्रम सारामध्ये सद्गुरु पादुका पूजन करून चरणोदक घेऊन, अनुग्रह घ्यावा असे म्हटले आहे. त्यानंतर श्रीधर सज्जनगडावर जायला निघाले. पळणीटकरांनी त्यांना एक रुपया दिला. आशीर्वाद देऊन नावलौकिक मिळवा असे म्हटले.

श्रीधर स्वामी पुण्याहून सातारा-सज्जनगडकडे पायीच जायला निघाले. पहिला मुक्काम त्यांनी बनेश्वरला केला. जवळपास २०-२१ किमी चालल्यावर रात्र झाली, थांबणे आवश्यक होते. रस्ता कच्चा खडबडीत असल्याने ठेचा लागणे स्वाभाविकच होते. बनेश्वर हे शिवाचे जुने प्राचीन देवस्थान आहे. निसर्ग परिसर रम्य आहे. सकाळी उठून देवळात जाऊन दर्शन घेतले. तेथे गावात जाऊन माधुकरी मागितली. विजयादशमी असल्याने गावातील लोक दर्शनास येत होते. मंदिरात जप झाल्यावर भोजन करून दुपारी पुन्हा सज्जनगडकडे जावयास निघाले. तिसऱ्या दिवशी स्वामी सायंकाळी सातारा येथील पवई नाक्यावर येऊन पोहोचले. तेथे विश्राम करून अजिंक्यताराचा बोगदा ओलांडून गडाच्या रस्त्यावर त्यांची पावले झपाझप चालत होती. मुखाने श्रीरामाचा जप सुरू होताच. गडावर चढताना पहिली कमान, दुसरी कमान पार करून जात होते.

निनादात ते समाधी स्थळा पाहाचल. उजव्या बाजूल समाधी स्थान व डाव्या बाजूला त्यांचे शेजघर होते. ४-५ पायऱ्यावरून खाली उतरून समाधीजवळ येऊन बसले. डोळ्यातून अश्रुधारा वाहात होत्या. वाणी के झाली होती. ‘मना उन्मनी शब्द कुंठील कुंठीत राहे। तो गे जो राम सर्वत्र पाहे।’ श्रीधरस्वामी स्वतःचे भान विसरुन गेले होते. समाधीला साष्टांग नमस्कार केला. त्रयोदशी मंत्राची एक माळ त्यांनी समाधीला अर्पण केली. नंतर वर असलेल्या श्रीरामाचे दर्शन घेतले. गडावरच्या व्यवस्थापकांनी त्यांना जेवणासंबंधी विचारून भोजनाचा प्रसाद दिला. इ.स. १९४७ साली संस्थानचा कारभार श्री. मंत्री बघायचे. काही वेतन न घेता ते निःस्वार्थ, नि:स्पृह वृत्तीने गडावरची व्यवस्था पाहायचे. त्याकाळी गडावर तीन दिवसाचे वर कोणालाही राहू देत नव्हते. श्रीधरांना गडावरचे नियम, नित्यनेम कार्यक्रम याबद्दल काहीच माहिती नव्हती. ‘तुम्ही किती दिवस राहणार ?’ एका कारभाऱ्यानी त्यांना विचारले. प्रश्न ऐकून श्रीधरांना थोडे आश्चर्यच वाटले. ते तर तपश्चर्याच करायला आले होते. त्यांनी ‘मी तर कायमचाच राहायला आलो आहे.’ हे उत्तर दिले. ते शक्य नाही. तुमचा राहण्याचा उद्देश समजल्याशिवाय व व्यवस्थापकांची परवानगी घेतल्याशिवाय राहता येणार नाही. व्यवस्थापकांना भेटून, चर्चा झाल्यावर असे. ठरले की तुम्हाला येथे सेवा द्यावी लागेल. मठातील नित्यनेमाची कामे करावी लागतील, इत्यादी इत्यादी. श्रीधरबुवा सर्व करायला तयार झाले. शेवटी समर्थांचीच सेवा घडणार आहे या आनंदात ते होते. सज्जनगडावर इ.स. १९२७ अश्विनी पौर्णिमेपासून ते १९३० च्या माध वद्य नवमीपर्यंत श्रीधरबुवा तेथे राहिले. गडावरच्या वातावरणात राहिल्याने त्यांच्या नित्यनैमित्तिक कार्यात फरक पडला. पहाटे उठून स्नानसंध्या आटोपून, पूजा अर्चा करून जपाला बसायचे. नंतर स्वयंपाक खोलीत जाऊन काही हातभार लावायचा. नैवेद्य तयार करून देवाला दाखवायचा. लोकांना प्रसाद देण्याचे, वाढण्याचे काम ते करायचे. श्रीराममंदिराचा गाभारा, समर्थांची समाधीची जागा, शेजघर झाडून, धुवून काढण्याचे काम त्यांनी रोजच्या करिता स्वत:कडे ठेवले, समाधीची वस्त्रे धुवून वाळत टाकणे, देवपूजेची भांडी, तांबे, लोटी, गड्डू, इत्यादी धुवून स्वच्छ करणे. तेथील पुष्पवाटिकेला पाणी घालून फुले वेचणे, माळा तयार करणे. तळशीपत्र, मंजिऱ्या वेचणे इत्यादी बारीक सारीक कामे ते स्वतः करायचे. समाधीला गंधाचा लेप बराचसा लागायचा. ते गंध उगाळून ठेवायचे. समर्थांच्या पलंगावरचे वस्त्र, चादरी धुवून स्वच्छ करून बदलणे अशा अनेक कामात त्यांचा वेळ जायचा. दुपारी, सायंकाळी भजन, कीर्तन, सवाया, दासबोध, मनोबोध इत्यादी ग्रंथांचे आळीपाळीने पठण करायचे. त्यावेळेस सोनतळ्याहून पाणी आणावे लागत असे. रोज ४०-४५ घागरी लागायच्या. या कामात देखील श्रीधरबुवांनी तत्परता दाखविली. त्यावेळी अंदाजे रोज २५-३० माणसे जेवायची. इतकी नित्यनेमाची कामे करून देखील श्रीधरस्वामी कधी थकले नाही की कामाचा अहंकार जडला नाही. कोणत्याही कामाला कधी नाही म्हटले नाही. गडावरचे उत्सव, रामनवमी, हनुमानजयंती इतर सणासुदीला काम वाढायचे. गावातील लोक दर्शनाला यायचे. पण त्यावेळी श्रीधरस्वामींना एक आगळा वेगळा उत्साह व स्फूर्ति यायची. एकदा व्यवस्थापक श्री. मंत्री यांना काही महत्त्वाच्या कामाकरिता बाहेर गावी जायचे होते. प्रश्न असा पडला की गडावरची कामाची देखरेख को करणार ? तो प्रश्न श्रीधरबुवानी सोडविला. तुम्ही निश्चिंतपणे जा. मी येथेच आहे. काळजी करण्याचे कारण नाही. आणि श्रीधरस्वामीनी त्यांची उणीव भरून काढली. त्यांच्या या प्रेमळ स्वभावाने व दुसऱ्याला त्रास न होऊ देता, कोणाला दुःख न दिल्यामुळे ते सर्वांचेच आवडते झाले होते. गडावर आलेल्या साधुसंतांची, वयोवृद्ध व्यक्तीची ते सेवा करीत. त्यांना कशाचीही कमी ते पडू देत नसत. श्रीधरबुवाचा वर दिलेला नित्यक्रम एक दीड वर्षे चालला. पण काही सेवेकऱ्यांना त्याचा हेवा वाटायला लागला. श्रीधरांचे प्रस्थ वाढतच चालले होते. त्यात मर अशी पडली. दोन फौजधारी गडावर नियुक्त झाले. त्यांची पाहण्याची नजर म्हणजे समोरचा चोर, लबाड, लुच्च्या असायला पाहिजे. या भावाने ते पाहत आणि इतरांशी बोलत असत. श्रीधरांबरोबर त्यांचे वागणे असेच. ढोंगी बाबा आहे. सर्व काही माहित असल्याचे ढोंग . तू काय स्वतःला समर्थ समजतो का ? हा करतो. कोणाशी नीट बोलत नाही अशा पद्धतीचे विष त्यांनी गडावरच्या लोकांच्या मनात कालवायला सुरु केली. त्यांना साथ एक स्वयंपाकी बाई व एक पाखंडी नारणमा  श्रीधर स्वामींची ‘कागळी’ ‘लावालावी’, चुगलखोरी व्यवस्थापकाकडे नेली. त्यांनी सुरुवातीला कानाडोळा केला. पण ही रोजची तक्रार होऊन बसली. श्रीधरबुवा गुरुद्रोही आहेत. येथे विनाकारण सेवेचे निमित्त सांगून, फुकटात दिवस काढत आहे. एके रात्री श्रीधरस्वामी जप करीत असताना जारण-मारण मंत्रधारी साधूने यक्षिणीला बोलावून श्रीधरांच्या अंगावर सोडली, रामनामाच्या जप करणान्याला कोणतीही भूत प्रेत बाधा त्रास देत नाही. हे सर्वांना माहित आहे व सर्वाची याबद्दल खात्री पण आहे. त्या यक्षिणीने श्रीधरबुवांना तर त्रास दिला नाही पण ती उलटी त्या पाखंडी साधुवरच चालून गेली. त्यामुळे तो पाखंडी साधू मी चुकलो! मला वाचवा 11 मला क्षमा करा. पुढे कधी असे करणार नाही असे बडबडत लोळायला लागला. सर्वजण जागे झाले. त्या साधूने आपली चूक कबुल केली. तो श्रीधर स्वामींच्या पाया पडला. ही घटना दुसऱ्या दिवशी व्यव्थापकांना द अधिपती श्री. बापूसाहेबांना कळली. त्यांनी या चारही जणांना कामावरून काढून टाकले. श्रीधर स्वामींच्या मार्गातील बाधा दूर झाली. असा समर्थ सेवेचा आदर्श श्रीधर स्वामींनी त्यांच्या गडावरच्या वास्तव्यात घडवून आणला. एके दिवशी सकाळी ब्राह्मीमुहूर्तावर श्रीधर स्वामी समाधीकडे जाणाऱ्या भुयारात ध्यानस्थ बसून जप करत होते. एकाएकी भुयारात लख्ख प्रकाश पडला. त्या दिव्य प्रकाशाने चारी दिशा उजळून निघाल्या होत्या. आपण कोठे आलो आहे. हे स्वामींना कळत नव्हते. त्या तेजोमय प्रकाशातून एक तेज:पुंज मूर्ति बाहेर आली. ते समर्थच असल्याचे जाणून श्रीधरबुवांनी साष्टांग नमस्कार केला. दोघांमध्ये मूळ संवाद होऊन त्या तेज:पुंज व्यक्तीने श्रीधरांना शक्तिसंक्रमण केले. श्रीधरबुवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. अंगावर रोमांच उभे राहिले होते. हा आत्मसाक्षात्कारच होता. ही घटना ‘श्रीधरस्वामी महाराज यांचे चरित्र’ या पुस्तकात श्री. मारुतीबुवा रामदासीनी लिहिली आहे. अशा एके दिवशी त्यांना दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा समर्थांनी दिली. त्यानुसार श्रीधरबुवांनी समर्थांचा जयजयकार करीत दक्षिणेकडे प्रस्थान केले. गडावर असताना श्रीसमर्थांची पुण्यतिथी-दासनवमी उत्सवाची गोष्ट आहे. स्वामींना उत्सव विशाल, भव्य रितीने साजरा करायची इच्छा होती.

रघुवीर समर्थ रामनवमी विशेषाक अनुग्रहित होते. त्यांनी उत्सवाची तयारी सुरू केली. कर्नाटकातील भक्तांनी खूप देणगी पाठविली होती. बाहेरच्या गावाहून अनेक भक्तजन आले होते. सर्वांना सकाळी चहा, दूध, कॉफी, नाश्ता देण्याची व्यवस्था केली होती. दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेखा ठरविली गेली. भजन, किर्तन प्रवचनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले. भक्तांनी आक्काबाई मठीचा जिर्णोद्धार करून त्यांच्या समाधीवर एक सुंदर इमारत बांधली होती. त्या इमारतीचे उद्घाटन श्रीधर स्वामींच्या हस्ते झाले. त्यावेळी सातारा येथील कलेक्टर श्री. पाटील साहेब समारंभास उपस्थित होते. स्वामींनी ‘हिंदू धर्म व हिंदूंच्या वैभवशाली जीवनाचे मर्म’ या विषयावर बोधप्रद भाषण केले. दासनवमीचे नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम तसेच समर्थ वाङ्मयावर प्रवचन, चिंतन, मननात गेले. सर्व मानकरी सेवक, मंडळींना नारळ देऊन निरोप घेतला.श्रीसमर्थ रामदास स्वामींचा जन्म होऊन साडेतीनशे वर्षे होत आले. त्या निमित्ताने समर्थांचा जन्मोत्सव संपूर्ण भारतभर साजरा व्हावा या उद्देशानी श्रीधरबुवा प्रयत्न करीत होते. वर्षा अगोदर त्यांनी या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करण्यात सुरुवात केली. त्रयोदशी मंत्राचा तेरा कोटी जप करून, यज्ञ करण्याचे ठरले. यज्ञाचे नेतृत्व श्री. गणेशशास्त्री खरे व दत्तभट महाबळेश्वर यांचे कडे होते. सर्व भारतातून समर्थ भक्तांनी जपाची संख्या आणून सज्जनगडावरच्या समाधीला वाहिली. श्रीसमर्थांचा जन्म हा रामनवमीच्या दिवशीचाच होता. श्रीसमर्थ जन्मोत्सव सुरू झाला. यागयज्ञादी कार्यक्रम झाले. श्रीधरस्वामी स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाची देखरेख करत होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून पन्नास वैदिक ब्राह्मण आले हो हे तेरा कोटीचे अनुष्ठान दोन वर्षात पूर्ण करायचे ठरले. पन्नास मंडळीनी यात भाग घ्यावा असा मानस होता. ही योजना श्रीधरकुटीत केली होती. या कार्यक्रमाचे नेतृत्व श्री. अण्णाबुवा कालगांवकर यांचेकडे सोपविले होते. श्रीधरबुवांनी तारकमंत्राचा उपदेश केला. त्यांना दोन वर्षाचा एकांत या निमित्ताने लाभणार होता. प्रत्येकजण स्नान संध्या करून येत असे. प्रत्येकाने तेरा सूर्यनमस्कार घालावेत असा दंडक होता. सामुदायिक नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे। ध्यानाचे श्लोक सांगून झाले की अनुष्ठानास सुरुवात होई. अनुष्ठानास अधिक साधक यायला लागल्याने आठ महिन्यातच तेरा कोटीचा संकल्प पूर्ण झाला.

श्रीधरस्वामी सज्जनगडावर असताना त्याच्या अध्यक्षतेखाली एक भव्य कीर्तन संमेलन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोमांतक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेशाहून जवळपास दोनशे कीर्तनकार जमा झाले होते. कार्यक्रम समर्थ समाधीच्या समोरच्या मंडपात ठेवण्यात आला होता. अध्यक्षस्थानी श्रीधरस्वामी विराजमान होते. श्रीधरांनी संमेलनाचे प्रयोजन काय ? कीर्तनाचे महत्त्व व परंपरा यावर लोकांना प्रबोधन केले. संमेलन तीन दिवस चालले. प्रत्येकाला अर्धा तासाचा वेळ देण्यात आला होता. नामवंत कीर्तनकार डॉ. विनायकबुवा पटवर्धन, मुरलीधरबुवा निजामपूरकर, रामचंद्रबुवा शिरवळकर, गोविंदस्वामी आफळे, मद्रासचे श्री. पंतलु इत्यादी लोक हजर होते. श्रीधर स्वामींनी प्रत्येक कीर्तनकारास जाण्यायेण्याचा खर्च व प्रत्येकी दोनशे रुपये मानधन म्हणून दिले. हा खर्च स्वतः स्वामीजींनी केला.

श्रीधरस्वामीनी सन १९५९ साल या चातुर्मास सज्जनगडावर केला होता. श्रीधरकुटीच्या माडीवर व्यवस्था केली होती. गडावरची व्यवस्था श्री. दिनकर बुवांकडे सोपविली होती. स्वामींच्या सेवेकरिता धारेश्वर येथील श्रीलक्ष्मीनारायण भट हा तरुण होता. स्वामींना एकांत मिळावा म्हणून दारावर पहारा देत असे. पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता स्वामीजींनी मौनव्रतयुक्त चातुर्मासाला सुरुवात केली. स्वामी एकांतात त्रिकाळ स्नान करीत व चिंतन, मनन करीत. पुण्याचे डॉ. ल. शं. भावे यांनी गाय देऊन दुधाची सोय केली होती. मुंबईचे श्री. शंकरराव उर्फ मामा काणे यांनी सतत चार महिने मुंबईहून फळांच्या करंड्या पाठविण्याचे काम केले. विजयादशमीच्या दिवशी श्रीधरस्वामींनी कुटीच्या एका भिंतीवर काव्य लिहिले. त्याच दिवशी सायंकाळी श्रीधर कुटीच्या गॅलरीत उभे राहून सर्वांना दर्शन दिले.श्रीधर स्वामींची सज्जनगड ही तपोभूमीच होती. दक्षिणेकडे जा, श्रृंगेरी जा, मुंबईला जा, सोलापूरला जा, कन्याकुमारीला जा. ते परत सज्जनगडावर येऊन समर्थांच्या सान्निध्यात राहात. त्यांना एकांत फार प्रिय होता. सज्जनगडाला दोन वर्षे एकांत, वरदपूरला पाच वर्षे एकांत, त्या एकांतात त्यांची समाधी लागे, त्याच्या जवळच्या शिष्याने एकांताबद्दल प्रश्न विचारल्यावर, स्वामींचे उत्तर होते. ‘सर्व कर्माचा’ त्याग करून सतत ब्रह्मास्थितीत असणे यालाच एकांत म्हणतात.’ महानिर्वाणापूर्वी श्रीधरस्वामी वरदपूरला एकांतात होते. तेथेच त्यांनी १९ एप्रिल १९७३ रोजी सकाळी देह ठेवला.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

 

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be/feed/ 0
श्री सद्गुरू चरित्र पहिला अध्याय https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2/#respond Sun, 21 Jan 2024 05:51:37 +0000 https://www.sadguruvani.in/?p=72

अध्याय पहिला

मंगलाचरण

                                                             ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
                                                               || श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।

                                               || श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नम: ।।

हे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना मी तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध् आहेस. तुझ्याा हालणाऱ्या कांनापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्याा साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते . संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात.

हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरीब्र्म्हादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्त्या, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. मला ज्ञान दे, बुद्धी दे, हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्याा शरणी आलो आहे. गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे.

आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. हे सरस्वतीमाते, मी तुला वंदन करतो. वेद शास्त्रेपुराणे तुझ्यााच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे.श्रीनृसिंहसरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसुत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते, म्हणून तू मला या ग्रंथलेखानासाठी प्रेरणा दे. मला स्फूर्ती दे. मला विद्यादान दे.

आता मी ब्रम्हा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख-चक्र-गदा-पद्मधारी त्या नरहरि विष्णूने गळ्यात वैजन्तीमाला धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो.तो मोठा कृपाळू, दयाळू आहे. आता मी पंचमुख, गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जग्नमाता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो, म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो। ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले, त्या सृष्टीकर्त्या ब्रम्हदेवाला मी वंदन कर्तो. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध्साध्य, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्या जवळ कवित्व नाही. ग्रंथरचना कशी करतात ते माहित नाहीं. मला मराठी भाषा नीट येत नाही. मला शास्त्रज्ञान नाही, म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी. अशाप्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई-वडिलांना-पूर्वजांना नमस्कार करतो.

आपस्तंभ शाखेचे, कौंडीण्य गोत्रात जन्मास आलेले सायंदेव हे आमचे मूळपुरुष. साखरे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ. त्यांचा पुत्र देव्रो. देव्रवांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. आश्वलायन शाखेचे, कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या ‘चंपा’ हि माझी आई. माझा पिता गंगाधर. ते सदैव श्रीगुरुंचे ध्यान करीत असत, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून ‘सरस्वती-गंगाधर’ असे स्वतःचे नाव धारण केले.

श्रीगुंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधूसंतांना संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार, मी या सर्वांना प्रार्थना करतो कि, मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून आमच्या कुलावर श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केल. ते म्हणाले, “तू आमचे चरित्र कथन कर. त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील” . गुरुंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच. श्रीगुरुंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्रीनृसिंहसरस्वती हे त्रयमुर्ती श्रीदत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल? परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रापौत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण-पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण-पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करिल. त्याला सर्वप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील. श्रीगुरुकृपेने त्याला रोगाची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्वप्रकारची बंधने नष्ट होतील. अशी हि परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे, श्रोते हो ! मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्रचित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्यामाझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नक. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो. त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे. उस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्रीगुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते, म्हणून श्रोते हो ! आपण लक्षपूर्वक ऐका.

श्रीगुरू नृसिंहसरस्वती गाणगापुरक्षेत्री असतना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्रीगुरुंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गंगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात,तेथे जाऊन श्री गुरुंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात . चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्रीगुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान-भूक विसरून गाणगापुराकडे निघाला. ‘आता एकतर श्रीगुरुंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करिन’ असा निर्धार करून तो श्रीगुरुंचे स्मरण करीत जात होत. तो मनात श्रीगुरुंना आळवीत होता, “अहो गुरुदेव, लोखंडाला परीस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे. ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता, मला इते दु:ख का बरे भोगावे लागते? परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात. परमदयाळू आहात. सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्या-बद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे कुणाकडे जाऊ?” अशाप्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुनः पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता.

“अहो गुरुदेव, कलियुगात श्रीगुरू हेच आहेत. ते कृपासिंधू आहेत. भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षणकरते आहेत. ते नृसिंहसरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील.” असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहित नाही. माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात. माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे मत, पिता, सखा,बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुध्दा तुमचेच भजनपूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य, दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालनपोषण कर्ते. सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दुख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा, दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळलोकात पाठविले. तुम्ही श्री रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले? परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वी नि:क्षस्त्र करून ब्राम्हणांना दिलीत,त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? अहो आहात. साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता? आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दुध पाजणारी आई त्याच्याकडे काय? मागते काहीच नाही. आधी घेऊन मग देणाऱ्याला ‘दाता’ असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी, विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे, तर आमच्या पूर्वजांनी आणेल वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडीलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही, तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेइन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असे कठोर का वागता ? मी तुमचा दासानुदास आहे.

प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव,तुम्हीच माझे आई-वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथरक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाशालाही पाझर फुटेल, मग माझ्याविषयी तुम्हाला करुन का येत नाही?

त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्रीगुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रुने त्यांच्या चरणांना स्नान घतले. त्यांची आपल्या हृदयमंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केलि. त्याच्या हृदयात श्रीगुरू स्थिर झाले. अशाप्रकारे श्रीगुरू आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात, त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो. अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील ‘मंगलाचरण’ नावाचा अध्याय पहिला समाप्त.

                                                                      ॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु!! 

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2/feed/ 0
अक्कास्वामी https://www.sadguruvani.in/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/ https://www.sadguruvani.in/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/#respond Sun, 21 Jan 2024 05:25:28 +0000 https://www.sadguruvani.in/?p=67

ज्जनगडावरील समर्थांच्या शिष्या आक्कास्वामी..
मर्थ रामदासांच्या सज्जनगडावरील गादीचा सांभाळ समर्थोत्तर सुमारे चार दशके करणाऱ्या चिमणाबाई अर्थात आक्काबाई .

सतराव्या शतकातच नव्हे, तर एकूणच ब्रिटिशपूर्व भारतात बहुतांश युवकांना ‘सुशिक्षित’ करण्याची वा ठरविण्याची सोय ही बहुधा एका विशिष्ट धार्मिक-आध्यात्मिक, संस्कृत भाषिक परंपरेकडे अथवा राजसत्तेकडे केंद्रित असावी, अशा नोंदी समाजशास्त्रीय इतिहासात आढळतात. विविध शतकांतील अनेक संतांनी जरी आपापल्या स्तरावर त्याचा विरोध करीत, भारतीय ज्ञानाला प्राकृत-व्यवहारी भाषेतून प्रवाहित करीत लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न केला, तरी तो यत्न हा काही अंशी त्यांच्या-त्यांच्या आयुष्यापुरता मर्यादित ठरत होता. अशा अनेक अव्यवस्थांचे प्रश्न महाराष्ट्राच्या समर्थ रामदासांना भारतभ्रमणात साडेतीनशे वर्षांपूर्वी जाणवले (‘समर्थाचे प्रपंचविज्ञान’, संपा. श्री. म. माटे). अर्थात, तसा समर्थविचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्काळी एका आधुनिक वैचारिक चळवळीचे स्वरूप धारण केलेल्या समाजगटाला नाव मिळाले : समर्थ रामदास स्थापित रामोपासक व ज्ञानोपासक ‘रामदासी संप्रदाय’!समर्थांची स्त्री जीवनाकडे पहाण्याची दृष्टी वेगळी आहे. स्त्री पुरुषांमधील समानता त्यांनी पुढीलप्रमाणे सूचित केली आहे.पुरुषास स्त्रीचा विश्वास ! स्त्रीस पुरुषाचा संतोष !परस्पर वासनेस बांधून टाकेल !सासरी दु:ख सहन करणाऱ्या स्त्रियांविषयी समर्थांच्या मनात आदर आहे हे त्यांच्या साहित्यात दिसून येते.वास्तविक पाहता, भारतातच नव्हे तर जगभरातील विविध धर्मामध्ये सर्वसाधारणपणे बहुतांश ठिकाणी स्त्रियांचे नेतृत्व अपवादात्मकच ठरले आहे. तरीही स्त्रियांनी धर्म-अध्यात्मांत नेतृत्व करावे, ही वेगळी भूमिका समर्थानी केवळ शक्तिस्तोत्रांसारख्या रचनांमधून सांकेतिक केली नाही, तर बरोबरीने समर्थानी १८ स्त्रियांना रामदासी मठांच्या मठपती होण्याचा मानही दिला होता. त्यातील वेणाबाई व बाईयाबाई (मिरज), अंबिकाबाई (राशिवडे व वाळवे), नबाबाई (तापीतीर, गुजरात), मनाबाई (राजांगणी), सखाबाई व कृष्णाबाई (चाफळ), अन्नपूर्णाबाई (उद्धवाची आई-टाकळी), सतीबाई (महाबळेश्वर), आपाबाई, द्वारकाबाई, गंगाबाई, मुधाबाई, बाकुबाई, भीमाबाई, गोदाबाई, अंताबाई (कृष्णातीरी) आणि सज्जनगड-संप्रदायाचे मुख्यालय सांभाळणाऱ्या समर्थशिष्या चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई या सर्व स्त्री-मठपतींचा उल्लेख ‘गिरिधर-बखरी’मध्ये येतो.
तसे चिमणाबाई या इ.स. १६४४ मध्ये संप्रदायात सहभागी झाल्या. त्या मूळच्या कराडच्या रुद्राजीपंत देशपांडे या जमीनदाराची बालविधवा कन्या होत. मुलीची हुशारी लक्षात घेऊन रुद्राजीपंतांनी कन्येला समर्थ संप्रदायाचे उपासक केले. चिमणाबाई लिहिण्या-वाचण्याच्या बरोबरीने घरच्या सुबत्तेमुळे दफ्तरी फडावरील कामे, घोडेस्वारी, तलवारबाजी अशा कौशल्यांत निपुण असल्याने समर्थानीही या चिमणाबाईंना ‘आक्का’ म्हणून संबोधल्याने त्यांचा सांप्रदायिक दफ्तरात उल्लेख ‘आक्कास्वामी’ असा आढळतो. वास्तविक समर्थाच्या प्रमुख २१ शिष्यांमधील १७ पुरुष शिष्य हे कायमच भारतभरातील विस्तारात व्यस्त असत. तसेच उर्वरित चार स्त्रियांमध्ये वेणाबाई या मिरज मठपती (मठात आजही त्यांचे विपुल लघुग्रंथ व स्फुट रचना उपलब्ध), सतीबाई या महाबळेश्वर मठपती (समर्थशिष्य बाजीपंत सरदारांच्या पत्नी), अंबिकाबाई या राशिवडे व वाळव्याच्या मठपती (यांचेही साहित्य उपलब्ध) आणि आक्काबाई या सज्जनगडाच्या मठपती होत्या. समर्थोत्तर ३९ वर्षे भारतभरातील सर्व मठांच्या मुख्यालयाचे काम पाहणाऱ्या संप्रदायाच्या उत्तरदायी म्हणून एकमेव आक्काबाई! त्या हकिकतींच्या पानांमध्ये अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतात. आक्काबाईंनी ‘स्त्री-महंत मठपती’ या नात्याने समर्थाच्या पुण्यतिथीला ‘दासनवमी’ उत्सवाचे स्वरूप देऊन अनेक रामदासी मठपतींना उत्सवात विविध मानकऱ्यांची कामे नेमत, देशभरातील मठपतींना सज्जनगडावर उपस्थित राहण्याची मुत्सद्दी यंत्रणा निर्माण केली होती.अक्काबाईंनी ३५ वर्षे समर्थांच्या हयातीत चाफळचा कारभार सांभाळला शिवाय समर्थांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जन्गाडचा कारभार सांभाळला. १२ व्या वर्षापासून ८५ वर्षांपर्यंत रामरायाची सेवा करून त्या कृतार्थ झाल्या.औरंगजेबाच्या आक्रमणाच्यावेळी अक्काबाई यांनी गडावरील राम पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली. त्यांची समाधी सज्जनगडावर आहे. त्यांना अक्कास्वामी असे म्हटले जाई.
अक्कास्वामींचे तीर्थरूप व श्री समर्थाची भेट कृष्णा कोयनेच्या संगमावरील कर्हाड येथे झाली. तपस्येचा प्रभाव पाहून घरी बोलावले. आईवेगळी पोर, बालविधवा, एकदाच माहेरपणाला आली आणि इकडे तापाचे निमित्त होवून पतीचा मृत्यु झाला व वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. बालवयात तिचे केशवपन, नेमलेले आपलेपण पाहून समर्थ तीव्र स्वरात म्हणाले, पती निधनानंतर मलीची अशी तीव्र विटंबना खरोखरच रानटी माणुसकीहीन प्रथा आहे. यात मुलीचा काय दोष ? समर्थ म्हणाले, कदाचित् रामरायाचीच तशी इच्छा असावी. ह्या वैधव्याच्या स्थितीतच रामराय परमार्थाचा मार्ग दाखवतील. आक्कांचीही तशीच इच्छा होती. तिने समर्थांचा आशीर्वाद मागितला. वडिलांनीही सांगितले, माझ्या कन्येला अनुग्रह देऊन आपल्या कृपाछायेत ठेवावे. श्री समर्थांनी विनंती मान्य करून अनुग्रह दिला व म्हणाले, आजपासून तुम्ही रामदासी संप्रदायाच्या सदस्या व आमच्या शिष्या आहात. आजपासून तुमचे नांव आक्का (आधीचे नांव चिमणाबाई). याच नांवाने तुम्हाला संप्रदायी ओळखतील. आक्कांना घेवून समर्थ निघाले. समर्थांचा जेथे मुक्काम असेल तेथील स्वच्छता, बैठकव्यवस्था, पूजेची तयारी वगैरे सर्व कामे आक्कांची. श्री समर्थ सद्गुरुंवर नितांत श्रद्धा व भक्ति यामुळे समर्थांना केव्हा काय लागते हे त्यांना माहित झाले होते. सेवेत कुठेही काही कमी पडू नये म्हणून त्या दक्ष असत. श्री समर्थ आज्ञेनुसार आक्कांचे वडील हयात होते तोपर्यंत दोन दिवस अधूनमधून त्यांचेकडे जावून रहात असत. वडिलांच्या निधनानंतर छोटेसे दोन खणी घर, थोडी शेती समर्थ आज्ञेने सत्पात्र ब्राम्हणाला देवून समर्थ चरणी पुन्हा एका वस्त्रानिशी सेवेत रूजू झाल्या. आता मागे पाश, उपाधी काहीही नव्हते. पूर्ण चित्ताने रामरायाचीच उपासना, नामाचे अनुसंधान, हाती काम अंतरी नाम हे सूत्र ठेवून दिनक्रम सुरू झाला. सर्व शिष्यांचे दुखणे खुपणे मायेच्या ममतेने बघत. इतुकी माया कोठेही नाही. जगदीश जगाला रक्षितसे या समर्थांच्या दासबोधातील वचनाप्रमाणे त्यांचे वागणे बोलणे होते. त्यांच्या वर्तनातील चोखपणा, समुदायाला एकत्रित ठेवण्याची कृती, सौदार्हता यांचा अनुभव समर्थांसह सर्वजण घेतच होते. समर्थांनी आक्कांची खूपदा परीक्षा घेतली. समयसूचकता, कामसू वृत्ती, कामातील संयम, शिस्त, सहनशीलता, निरीक्षण शक्ती दांडगी होती. कामातील व्यवस्थापन उत्तम होत. हे सर्व पारखल्यानंतर समर्थांनी चाफळच्या मठाची सर्व व्यवस्था त्यांच्या हाती सोपवली.
मठमहंती म्हणजे सूळावरील पोळी. एका स्त्रीकडे महंती सोपवली. यातूनच श्री समर्थांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन किती विशाल, प्रगत, पुरोगामी होता याची साक्ष पटते. स्त्री ही परमार्थातील अडचण असे त्यांना कधीही वाटले नाही. स्त्रीया देखील समाजावर संस्कार करून समाजाची सुरचना करतात व स्वास्थ्य राखू शकतात हे समर्थांनी जाणले होते. समर्थांनी दाखवलेला विश्वास किती सार्थ होता हेच आक्कांनी केलेल्या दीर्घ कार्यातून समजते. रामायण, पांडवप्रताप, एकनाथी भागवत या ग्रंथांच्या सहवासात त्या वेळ घालवित असत.
अक्कास्वामींचे वेण्णास्वामींना मार्गदर्शन मिळे. मागच्या अंगणात तुळशी वृंदावनाजवळ दोघीही अध्यात्म चर्चेत रंगून जात. चाकणच्या मठात समर्थ निवांत असले तर दोघींना समोर बसवून तत्वे समजावून देत. देहास मृत्यु येतो पण आत्मा अजय, अमर आहे. तो मरत नाही. एकदा आत्मदर्शन झाले की तोच अंतरात्मा सर्वत्र भरून राहिला आहे हे जाणवत हीच सूक्ष्म दृष्टी याची शिकवण व इतर अनेक प्रश्नांची उत्तरे समर्थ देत असत.
समर्थांच्या मागे चाफळच्या मठाची सज्जनगडावरील व्यवस्था चोख सांभाळली. भोवताली यवनांचा धूमाकूळ, मंदिर व मठ यांची तोडफोड इत्यादि विध्वंसक कृत्ये त्यांनी आरंभली होती. आक्कांच्या हे कानावर आल्यावर चाफळच्या मूर्ती वाघापूरच्या गडावर सुखरूप ठेवण्याची व्यवस्था त्यांनी केली.
गडावरील रामपंचायतन घेवून बराच काळ त्या भूमिगत झाल्या. त्या वासोट्यास राहिल्या आहेत याचा कुणालाही पत्ता लागला नाही. त्या काळात त्यांचे खूप हाल झाले. अन्न पाणी पहायलाही मिळत नव्हते. खाणेपिणे तर लांबच ! इतक्या प्रतिकूल परिस्थितीत एका महिला महंताने हा दिलेला लढा होता.
श्री सद्गुरूंवरील निष्ठा, श्री रामांवरील अढळ श्रद्धा यांच्या जोरावर त्या तग धरून राहिल्या. जरा स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा दोन्ही मूर्ती पूर्ववत स्थानापन्न केल्या. विनम्र जीवन आचरण करणाऱ्या आक्कांनी हे कोणालाही सांगितले नाही की कोठे लिहिले नाही.त्यांना ८६ वर्षाचे दीर्घायुष्य लाभले. अनेक प्रसंगाच्या साक्षी अंतरंग शिष्यांच्या त्या अग्रेसर होत्या पण प्रौढी मिरवली नाही. समाजातील शुद्र, उपेक्षित घटकांविषयी सुद्धा सहानुभूतीने विचार केला. माऊली होवून समर्पित जीवन जगल्या. इ.स. १९२१ दिवाळीतील पाडवा या शुभदिनी सज्जनगड येथे त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. समर्थांच्या अंतिम प्रवासाच्या वेळी फक्त उद्धवस्वामी व आक्काई त्यांच्याजवळ होत्या. बाकी सर्व बाहेर थांबले होते.

 || जय जय रघुवीर समर्थ ||

]]>
https://www.sadguruvani.in/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/feed/ 0