॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ स्तवननाम दशक प्रथम ॥ १ ॥

समास पहिला : ग्रंथारंभ

॥ श्रीराम ॥

श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥
ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्‌गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की, आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे? (१)
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥
या प्रश्नावर समर्थ सांगतात की, या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरूशिष्यांच्या संवादातून भक्तिमार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. (२)
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥
नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून, विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे. (३)
भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥
भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. (४)
मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥
मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे निःसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे. (५)
शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥
या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्यमुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी, यांविषयी ठाम मते मांडली गेली आहेत. (६)
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥
शुद्ध स्वरूपस्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निःसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. (७)
मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥
मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे निःसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे. (८)
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥
मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो, हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. (९)
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥
या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे. (१०)
मायोद्भतवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥
मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे. (११)
नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥
नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. (१२)
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥
या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केलेगेले आहे. पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल. (१३)
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥
तथापि एवढे म्हणता येईल की, हा ग्रंथ वीस दशकांत विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात दहा समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे, त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे. (१४)
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥
हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचीती व आत्मप्रचीतीच्या आधारे लिहिला गेला आहे. (१५)
नाना समती‍अन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥
खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. (१६)
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वा क्यें ॥ १७॥
जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात, त्यांच्या हे लक्षातच येत नाही की, असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवद्‌वचनाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे, त्यांनाही ते मिथ्या ठरवीत असतात. (१७)
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८॥
भगवद्गीतता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाकक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २०॥
शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत, भगवद्‌गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश्णीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवद्‌वचनाच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. (१८-२०)
भगवद्वाचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे ।
भगवद्वाकक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१॥
भगवद्‌वचनास अनुसरूनच येथे विषयप्रतिपादन केले आहे आणि भगवद्‌वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल, असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे ? (२१)
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥
संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत, असे मानून त्यास नावे ठेवतो, तो केवळ दुरभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. (२२)
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥
वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. (२३)
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥
अशा रीतीने कामक्रोध बळावले, म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. (२४)
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥
जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो, त्यास भला कसे बरे म्हणावे ? अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे; पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का ? (२५)
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥
बरे आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे. (२६)
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७॥
ग्रंथारंभी श्रोत्यांनी ‘या ग्रंथात काय आहे ?’ असा जो प्रश्न केला होता, त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. (२७)
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥
आता ‘हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते ?’ या प्रश्नाचे उत्तर असे की, हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो. (२८)
मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥
कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्‍नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्यमुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते. (२९)
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥
अज्ञान, दुःख, विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते. हीच याची फलश्रुती होय. (३०)
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥
योगी ज्याला परमभाग्य मानतात, ते वैराग्य अंगी बाणते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. (३१)
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥
जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात, ते सुलक्षणी, चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळप्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. (३२)
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥
जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात, जे कुणी पापी होते, त्यांना कृतकर्माचा पश्चात्ताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कुणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात, ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. (३३)
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४॥
बद्ध असतात, ते ग्रंथश्रवणाने मुमुक्षू बनतात. मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्तिमार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात. (३४)
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥
केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते (३५)
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६॥
श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान (दुख शोकदि) तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग (अर्थात त्रिताप, पंचक्लेशादी) नष्ट होतात. (३६)
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥
या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की, केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच; शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते. (३७)
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥
ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी, वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. (३८)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला ॥ १॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे
‘ग्रंथारंभलक्षणनाम ‘ समास पहिला समाप्त.

समास दुसरा : गणेशस्तवन

॥ श्रीराम ॥

ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका ।
अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥
सर्वसिद्धींचा फळदाता, अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करतो. (१)
माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।
मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥
आपण माझे अंतःकरणास व्यापून सर्वकाळ तेथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपाकटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वदवून घ्यावा. (२)
तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।
आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥
तुझ्या कृपेच्या योगे भ्रांतीची पटले वितळून जातात. एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो. (३)
येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं ।
हो‍ऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥
गणेशाची कृपा झाली की विघ्ने चळचळा कापू लागतात. त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात. (४)
म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर ।
आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥
म्हणूनच गजाननाला ‘विघ्नहर’ नावाने संबोधले जाते. आमच्यासारख्या अनाथांना त्याचा मोठाच आधार वाटतो. हरिहरादी देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात. (५)
वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी ।
आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥
सर्व मंगलाचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यांत सर्वप्रकारे यश प्राप्त होते. ते करीत असताना संकटे ,अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही. (६)
जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान ।
नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥
मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले, तरीही मनाला परम समाधान वाटते. चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते. (७)
सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव ।
नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥
गणेशाच्या सगुण रूपाचे लावण्य व कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून तो जेव्हा नृत्य करू लागतो, तेव्हा सर्व देव देहभान विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहातच राहातात. (८)
सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत ।
हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥
त्याच्या गंडस्थळातून सतत मद गळत असतो, तो सदा आनंदाने डुलत असतो व अत्यंत आनंदाने उल्लसित झालेले त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेते. (९)
भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड ।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥
त्याचे रूप भव्य, दिव्य असून, देह अत्यंत विशाल व महाप्रचंड आहे. त्याचा भालप्रदेश विस्तीर्ण असून, त्यावर सिंदूर लावलेला आहे. (१०)
नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें ।
तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥
त्याच्या गंडस्थळातून थबथबा मदस्राव होत असतो व त्या मदस्रावातून दरवळणाऱ्या सुगंधांच्या परिमळामुळे आकर्षिले जाऊन भुंग्यांचे थवे मधुर गुंजारव करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात. (११)
मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥
गणेशाची सोंड सोटासारखी सरळ पण टोकास मुरडलेली आहे. कपाळावर दोन सुंदर आवाळे शोभत असतात. खालचा ओठ जरा लोंबत असतो आणि उग्र गंध असलेला मद क्षणक्षणाला गळत असतो. (१२)
चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥
गणेश हा चौदा विद्यांचा स्वामी असून, त्याचे डोळे फार लहान आहेत. त्या सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहात असतो. त्याचे कान खूप मोठे व लवलवित असून, त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो, तेव्हा त्यांचा फडफड आवाज येतो. (१३)
रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥
त्याच्या मस्तकावर नाना रत्ने ज्यांत जडविलेली आहेत, असा रत्नजडित मुकुट आहे व त्यातून नाना रंगांच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतात. कानात नीलमण्यांनी जडलेली कुंडले झगमगत असतात. (१४)
दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५॥
त्याचे दात पांढरे शुभ्र व ठसठशीत आहेत आणि त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडित कडी बसवलेली असून, त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात. (१५)
लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६॥
त्याचे पोट लवलवीत असून सारखे हालत असते व त्याला सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगुरांचा मंद मंद मधुर ध्वनी ऐकू येतो. (१६)
चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पितांबर ।
फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७॥
त्याला चार हात असून लंबोदरावर सोनसळी पीतांबर नेसलेला आहे, तर पोटावरील मोठा नाग सारखे फूत्कार यकतो. (१७)
डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी ।
उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८॥
तो नाग कमरेला वेढा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभिकमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिभल्या चाटत सर्वत्र टकमका पाहतो. (१८)
नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां ।
रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे ॥ १९॥
त्याच्या गळ्यात विविध जातीच्या फुलांच्या माळा कमरेतील सापापर्यंत पोहोचतील अशा लांबलचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडित हारांतील पदक अत्यंत शोभून दिसते. (१९)
शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥ २०॥
चारी हातांपैकी एका हातात परशू , एका हातात कमळ, एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो. (२०)
नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥
गणेश हा नृत्य, नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल असून टाळ, मृदंगाच्या तालावर नृत्याचे उपांग जे हुंकार ते करीत नानाप्रकारे नृत्य करतो. (२१)
स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण ।
साअजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥
इतका विशाल व थुलथुलीत देह असूनही चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरही स्वस्थ राहात नाही. त्याची साजिरी मूर्ती सुलक्षण व लवण्याची जणू खाणच आहे. (२२)
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पा‍उलें दोनी ॥ २३॥
पायांत नूपुरे रुणझुणत असतात, दंडांतील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो, तर मधुर झंकारणार्‍या घागऱ्यांमुळे दोन्ही पाउले भक्तांचे मन हरण करीत असतात. (२३)
ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा ।
साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥
गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते. त्याच्या कृपेमुळेच साहित्य निर्मितीच्यावेळी अष्टनायिका साह्य करू लागतात. (२४)
ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु ।
त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥
श्री समर्थ म्हणतात, असा जो सर्वांगाने सुंदर असणारा, सकळ विद्यांचे वसतिस्थान असा श्रीगणेश त्यास मी साष्टांग भावाने नमस्कार करतो. (२५)
ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६॥
त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित- चित्त माणसाच्या बुद्धीतही ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते. (२६)
जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७॥
ज्यास ब्रह्मादी देवही वंदन करतात, त्यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत ? म्हणून मंदमती असणारांनीही श्रीगणेशाचे चिंतन करावे. (२७)
जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण ।
तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८॥
कारण जे कुणी मूर्ख अवलक्षणी, अथवा हीनांहूनही हीन असतील, तेही श्रीगणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व विषयांत पारंगत होऊ शकतात. (२८)
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥ २९॥
असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे. त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते. कलियुगात देवी (चंडी) व गणेशाची उपासना करावी, असे शास्त्र सांगते. (२९)
ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति ।
वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥ ३०॥
म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे. (३०)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गणेशस्तवननाम समास दुसरा ॥ २ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवाादे
‘गणेशस्तवननाम’ समास दुसरा समाप्त.

समास तिसरा : शारदास्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता ।
शब्दमूल वाग्देवता । माहं माया ॥ १॥
मी आता वेदांची जननी, ब्रह्मदेवांची कन्या, शब्दब्रह्माची उत्पत्ती जिच्यापासून झाली त्या वाग्‌देवतारूपी महामायेला, श्रीशारदेला वंदन करतो. (१)
जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार ।
जे शब्दाचें अभ्यांतर । उकलून दावी ॥ २॥
तिच्यापासूनच शब्द स्फुरतात व वैखरी वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो. तीच शब्दांचे विविध अर्थ उकलून दाखवते. (२)
जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी ।
जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ ३॥
योग्यांच्या ठिकाणी समाधिरूपाने तर धैर्यवान पुरुषांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून स्वरूपी लीन करते. (३)
जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या ।
जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ ४॥
ती ईश्वराची भार्या असून प्रत्यगात्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्थाही तीच आहे. तिच्या आधारानेच साधुपुरुष महान कार्ये करण्यास प्रवृत्त होतात. (४)
जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती ।
जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ ५॥
ती महंताची शांती असून ईश्वराची निजशक्ती आहे, तर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्तिरूपाने प्रगटून नैराश्य रूपाने शोभत असते. (५)
जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी ।
आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥ ६॥
ती सहज लीलाविनोदरूपाने अनंत ब्रह्मांडांची उत्पत्ती व लयही करीत असते; पण आपण स्वतः मात्र आदिपुरुषाच्या ठिकाणी लपून राहते. (६)
जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे ।
जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७॥
हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व हे तिचेच रूप आहे असे भासते, पण तिचा शोध घेऊ गेले असता ती कोठेच सापडत नाही. अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही. (७)
जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा ।
जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८॥
या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधार असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरलेली निर्मल ‘एकोऽहं’ ही जाणीव हे तिचेच स्वरूप आहे. तीच साधकांच्या ठिकाणी ज्ञानशक्तिरूपाने प्रगट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देते. (८)
जे लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा ।
जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ॥ ९॥
जगातील सर्व लवण्याचे, सौंदर्याचे, शोभेचे ती उत्पत्तिस्थान असून, परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे. आपल्या अचिंत्य अशा शब्दशक्तीच्या साहाय्याने ही विश्वाभासरूपी संसार नाहीसा करून टाकते. (९)
जे मोक्षश्रिया माहांमंगळा । जे सत्रावी जीवनकळा ।
हे सत्त्वलीळा सुसीतळा । लावण्यखाणी ॥ १०॥
तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी सत्रावी जीवनकळा आहे. लावण्याची खाण अशी ही शारदा परम सुशीतल व सत्त्वशील असून जीवास सुख देणारी आहे. (१०)
जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ती ।
जे कळीकाळाची नियंती । सद्गु रुकृपा ॥ ११॥
अव्यक्त अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या साहाय्याने अत्यंत विस्तार पावली आहे. कळिकाळावरही सत्ता गाजविणाऱ्या सद्‌गुरुकृपेच्या रूपाने ती कार्यान्वित होते. (११)
जे परमार्थमार्गींचा विचार- । निवडून, दावी सारासार ।
भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळें ॥ १२॥
तीच सारासार विवेकरूपाने परमार्थमार्गात मार्गदर्शन करून शब्दांच्या आधारे भवसिंधूतून पैलतीरास पोहोचविते. (१२)
ऐसी बहुवेषें नटली । माया शारदा येकली ।
सिद्धचि अंतरी संचली । चतुर्विधा प्रकारें ॥ १३॥
अशाप्रकारे विविध वेषांनी ती नटलेली दिसली, तरी ती शारदा मायारूपाने एकच असून सिद्धपुरुषांच्या ठिकाणी ती परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चार वाणींच्या रूपाने वास्तव्य करून असते. (१३)
तींहीं वाचा अंतरीं आलें । तें वैखरिया प्रगट केलें ।
म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें । तें शारदागुणें ॥ १४॥
परा, पश्यंती, मध्यमा यांच्यात जे स्फुरते, तेच वैखरी वाणीने प्रगट केले जाते. म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेच प्रगट होत असते, हे जाणून घ्यावे. (१४)
जे ब्रह्मादिकांची जननी । हरीहर जयेपासुनी ।
सृष्टिरचना लोक तिनी । विस्तार जयेचा ॥ १५॥
अशी ही मूळमाया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासूनच विष्णू शंकरादी देव व तिन्ही लोकांची सृष्टिरचना होत असते. हा सर्व तिचाच विस्तार आहे. (१५)
जे परमार्थाचें मूळ । नांतरी सद्विद्याची केवळ ।
निवांत निर्मळ निश्चळ । स्वरूपस्थिती ॥ १६॥
जिला सद्‌विद्या असे म्हणतात, जी निर्मळ, निश्चळ निवांत (शांतिरूप) परमार्थाचे मूळच अशी स्वरूपस्थिती, ती म्हणजे शारदाच होय. (१६)
जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं ।
जे सिद्धांचे अंतःकर्णीं । समाधिरूपें ॥ १७॥
योग्यांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने, साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूपचिंतनाच्या रूपाने तर सिद्धांच्या अंतःकरणात समाधिरूपाने तीच राहते. (१७)
जे निर्गुणाची वोळखण । जे अनुभवाची खूण ।
जे व्यापकपणें संपूर्ण । सर्वांघटीं ॥ १८॥
ती चराचरांत संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपाच्या अनुभवाच्या योगे तीच निर्गुणाचा परिचय करून देते. (१८)
शास्त्रें पुराणें वेद श्रुति । अखंड जयेचें स्तवन करिती ।
नाना रूपीं जयेसी स्तविती । प्राणीमात्र ॥ १९॥
शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती अखंड तिचीच स्तुती करत असतात व सर्व प्राणिमात्रही नाना रूपाने तिचेच गुणगान करतात. (१९)
जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरोपमाची उपमा ।
जयेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २०॥
वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून ज्या परमात्म्याचे शब्दांत वर्णन होऊच शकत नाही, त्याचे उपमा-दृष्टांताच्या सहाय्याने वर्णन करून त्यास ‘परमात्मा’ हे नाव देणारी ही शारदाच आहे. (२०)
नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयाची बुद्धी ।
जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञेप्तीमात्र ॥ २१॥
परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीवरूपाने स्फुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हेच शारदेचे मूळरूप असून तीच नंतर नाना विद्या, नाना कला, नाना सिद्धी व नाना मतांसंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रगट होत असते. (२१)
जे हरिभक्तांची निजभक्ती । अंतरनिष्ठांची अंतरस्तिथी ।
जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायोज्यता ते ॥ २२॥
तीच हरिभक्तांच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने, अंतर्निष्ठांच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञाननिष्ठेच्या रूपाने तर जीवन्मुक्तांच्या ठिकाणी मुक्तिरूपाने वास करते व सायुज्यमुक्ती हेही तिचेच रूप आहे. (२२)
जे अनंत माया वैष्णवी । न कळे नाटक लाघवी ।
जे थोराथोरासी गोवी । जाणपणें ॥ २३॥
शारदा म्हणजे भगवंताची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लाघवी व नाट्यकलेत निपुण आहे. मोठमोठ्यांना ‘मी ज्ञाता’ या अभिमानाच्या जाणिवेत, मोहात ती गुंतविते. (२३)
जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दें वोळखिलें ।
जें जें मनास भासलें । तितुकें रूप जयेचें ॥ २४॥
जे जे काही दृष्टीस दिसते, नादरूपाने ऐकू येते वा जे जे मनाने कल्पिले जाते अर्थात जेथपर्यंत इंद्रियांची, मनाची धाव पोहोचते, ते सर्व मायेचे रूप समजावे. (२४)
स्तवन भजन भक्ति भाव । मायेंवाचून नाहीं ठाव ।
या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २५॥
अर्थात आपण जे जे काही स्तवन, भजन, साधन, भक्तिभाव इत्यादी करतो, तेही मायेचेच स्वरूप असून मायेखेरीज तेथे इतर काही नाही. या बोलण्यातील गूढार्थ जे स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील तेच जाणू शकतील. (२५)
म्हणौनी थोराहुनि थोर । जे ईश्वराचा ईश्वर ।
तयेसी माझा नमस्कार । तदांशेंचि आतां ॥ २६॥
म्हणून शेवटी थोराहूनही थोर व ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंशरूपानेच मी आता नमस्कार करतो. (२६)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शारदास्तवननाम समास तिसरा ॥ ३॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे
‘शारदास्तवननाम’ समास तिसरा समाप्त

समास चवथा : सद्‌गुरुस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां सद्‌गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ।
तें स्वरूप मज अज्ञाना । काये कळे ॥ १॥
मला सद्‌गुरूंचे स्तवन करावे अशी इच्छा तर आहे, पण ज्यांच्यापर्यंत माया पोहोचू शकत नाही, अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार ? म्हणून सद्‌गुरूचे वर्णन करताच येत नाही, असे म्हणावे लागत आहे. (१)
न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती ।
तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २॥
श्रुती ही आत्मविद्येची जननी असून ती सुद्धा ‘नेति नेति’ मला कळत नाही, कळत नाही असे ज्याच्याविषयी म्हणते, त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी समर्थ असेल ? (२)
मज न कळे हा विचारु । दुर्ह्हूनि माझा नमस्कारु ।
गुरुदेवा पैलपारु । पाववीं मज ॥ ३॥
तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हांला दुरूनच नमस्कार करून प्रार्थना करतो की, हे गुरुदेवा, मला पैलतीरास न्या. (३)
होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा ।
असाल तैसे असा । सद्गुलरु स्वामी ॥ ४॥
मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी अयोग्य आशा मी मनाशी बाळगली होती, पण माया आपणास स्पर्शच करू शकत नसल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झाला आहे. म्हणून ‘हे सद्‌गुरू स्वामी, तुम्ही असाल तसे असा’ एवढेच मी म्हणतो. (४)
मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन ।
माया जाली लज्यायमान । काय करूं ॥ ५॥
मायेच्या साहाय्याने आपले स्तवन करावे अशी इच्छा माझ्या मनात होती. पण मायाच लाजून बाजूस सरल्यावर मी तरी काय करू ? (५)
नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनी करावी लागे प्रतिमा ।
तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुुरूचा ॥ ६॥
मुख्य परमात्मा इंद्रियगोचर नसल्याने तो हाती गवसत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो. म्हणून आता त्या मायेचा आधार घेऊनच मी सद्‌गुरूचा महिमा वर्णन करीन. (६)
आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं ।
तैसा सद्गुारु हा स्तवनीं । स्तऊं ॥ ७॥
आपल्या मनात जसा भाव असेल त्यास अनुसरूनच ध्यानात मनाने आपल्या इष्ट देवाचे स्मरण करावे लागते. तशी माझ्या मनात जशी सद्‌गुरूची मूर्ती स्थिरावली आहे, तशीच ती आठवून त्या श्रीसद्‌गुरूचे मी स्तवन करतो. (७)
जय जया जि सद्गुखरुराजा । विश्वंभरा बिश्वबीजा ।
परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८॥
हे सद्‌गुरुराजा, तुझा जयजयकार असो ! तूच सर्व विश्वास व्यापले आहेस, तूच विश्वाचे मूळ कारण आहेस व तूच परमपुरुष आहेस; तसेच मोक्ष देणारा व दीनांचा बंधू तूच आहेस. (८)
तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे ।
जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९॥
जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो, तशी तुझी कृपा झाली की अनावर अशी मायाही ओसरू लागते. (९)
आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे ।
नीसी जालियां नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १०॥
सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला, तरी रात्र झाली की परत काळोखाने ब्रह्मांड भरून जाते. (१०)
तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव ।
समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११॥
पण सद्‌गुरू स्वामीराज तसे नाहीत. ते अज्ञानाचा समूळ नाश करतात व त्यामुळे परत जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावे लागत नाही. (११)
सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२॥
परीसस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की, ते परत लोखंड कधीच होत नाही. त्याप्रमाणे गुरूंनी आपल्या दासाचे अज्ञान एकदा समूळ नष्ट केले की, तो परत कधीही संशयात पडत नाही. (१२)
कां सरिता गंगेसी मिळाली । मिळणी होतां गंगा जली ।
मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३॥
किंवा नदी एकदा गंगेस मिळाली की त्यासरशी ती गंगाच बनते. मग कितीही प्रयत्न केले तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकतच नाही. (१३)
परी ते सरिता मिळणीमागें । वाहाळ मानिजेत जगें ।
तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥ १४॥
एखाद्या ओहोळाला नदीला मिळण्यापूर्वी जग लहान ओढाच म्हणते. पण नदीला मिळाल्यावर तो नदी होतो. तसा सामान्य साधक सद्‌गुरुकृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्‌गुरुकृपा झाली की तो तत्काळ गुरूच होतो. (१४)
परीस आपणा ऐसें करीना । सुवर्णें लोहो पालटेना ।
उपदेश करी बहुत जना । अंकित सद्गु<रूचा ॥ १५॥
परीस लोखंडाचे सोने करतो पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण जो साधक सद्‌गुरूचा कृपांकित होतो, तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो. (१५)
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णें सुवर्ण करितां न ये ।
म्हणौनी उपमा न साहे । सद्गु्रूसी परिसाची ॥ १६॥
परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही, पण सद्‌गुरुकृपेने शिष्यास मात्र गुरुत्वच प्राप्त होते; म्हणून सद्‌गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्य नाही. (१६)
उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतची क्षार ।
अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७॥
बरे त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो तर अत्यंत खारट असतो म्हणून तीही उपमा योग्य नव्हे. अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पांती क्षीरसागरही नष्ट होतो. म्हणून तीही उपमा देता येत नाही. (१७)
उपमे द्यावा जरी मेरु । तरी तो जड पाषाण कठोरु ।
तैसा नव्हे कीं सद्गु रु । कोमळ दिनाचा ॥ १८॥
सद्‌गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर मेरुपर्वत जड पाषाणाचा व कठोर आणि सद्‌गुरू तर दीन शरणागताविषयी अत्यंत कोमल अंतःकरणाचे असतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. (१८)
उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण ।
या कारणें दृष्टांत हीण । सदद्‌गुरूस गगनाचा ॥ १९॥
बरे ! सद्‌गुरूंना गगनाची उपमा द्यावी, तर त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडचे निर्गुण आहे. म्हणून गगनाची उपमासुद्धा हीन ठरते. (१९)
धीरपणे । म् उपमूं जगती । तरी हेहि खचेल कल्पांतीं ।
म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीण वसुंधरा ॥ २०॥
धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल. म्हणून तिची उपमाही अयोग्य ठरते. (२०)
उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती ।
शास्त्रें मर्यादा बोलती । सद्गुचरु अमर्याद ॥ २१॥
सद्‌गुरू परम प्रकाशरूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहे. पण सद्‌गुरूचे सामर्थ्य अमर्याद आहे. ते नित्य परम प्रकाशरूपच आहेत. (२१)
म्हणौनी उपमे उणा दिनकर । सद्गुfरुज्ञानप्रकाश थोर ।
उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२॥
सदगुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणारा असल्याने त्याला सूर्याची उपमा देताच येत नाही. बरे शेषाची उपमा द्यावी तर त्याने स्वतःच पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे. परंतु श्रीगुरू शिष्याचा संसारभार दूर करतात. म्हणून तीही उपमा देता येत नाही. (२२)
उपमे द्यावें जळ । तरी तें काळांतरीं आटेल सकळ ।
सद्गुसरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३॥
आता जीवनदायी व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी, तर कालांतराने पाणीही आटून जाते. शिवाय ते चंचल असते, पण सद्‌गुरु-स्वरूप निश्चल असून त्याचा नाश कधीच होत नाही. (२३)
सद्गु रूसी उपमावे । म् अमृत । तरी अमर धरिती मृत्यपंथ ।
सद्गुररुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४॥
त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाहीत. पण एकदा सद्‌गुरूची कृपा झाली की, शिष्य मात्र अमर होतो. म्हणून ही उपमाही देता येत नाही. (२४)
सद्गुररूसी म्हणावें कल्पतरु । तरी हा कल्पनेतीत विचारु ।
कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५॥
सद्‌गुरूला कल्पतरूची उपमाही देता येत नाही. कारण तो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेतील पदार्थच देतो. पण सद्‌गुरू कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात. मग कल्पतरूचा अंगीकार कोण करील बरे ! (२५)
चिंता मात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी ।
कामधेनूचीं दुभणीं । निःकामासी न लगती ॥ २६॥
सदगुरूंना चिंतामणीची उपमाही देता येत नाही. कारण ते शिष्याच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाहीत. त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो. मग निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता वा पान्हा यांची आवश्यकताच उरत नाही. म्हणून चिंतामणी वा कामधेनू यांच्याही उपमा सद्‌गुरूना देता येत नाहीत. (२६)
सद्गुीरु म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत ।
ज्याचे द्वारीं असे तिष्टत । मोक्षलक्ष्मी ॥ २७॥
सद्‌गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे, तर तेही योग्य नव्हे कारण लक्ष्मी चंचल असते, नाशिवंत असते, पण सद्‌गुरूंच्या दारी तर साक्षात मोक्षलक्ष्मी त्यांच्या कृपाकटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते. म्हणून ही उपमाही देता येत नाही. (२७)
स्वर्गलोक इंद्र संपती । हे काळांतरीं विटंबती ।
सद्गुतरुकृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८॥
स्वर्गलोक, इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात. पण सद्‌गुरूची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही. (२८)
हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक ।
सर्वदा अविनाश येक । सद्गुवरुपद ॥ २९॥
ब्रह्मा, विष्णू शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात. एक सद्‌गुरुपदच असे आहे की ते अविनाशी आहे. (२९)
तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३०॥
फार काय सांगावे, ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे. फक्त सद्‌गुरूचे स्वरूपच शाश्वत अविनाशी आहे. तेव्हां त्याची उठाठेव करण्यातही काही अर्थ नाही. (३०)
म्हणौनी सद्‌गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना ।
अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१॥
तेव्हा सद्‌गुरूंच्या रूपाचे वर्णन करता येण्यासारखे नाही, हेच माझे वर्णन आहे. जे अंतरीच्या खुणा जाणणारे असतात, त्यांनाच त्यांचे खरे स्वरूप कळते. (३१)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सद्‌गुरुस्तवननाम समास चवथा ॥ ४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘सद्‌गुरुस्तवननाम ‘ समास चौथा समाप्त.

समास पांचवा : संतस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान ।
जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १॥
आता परमार्थाचे जे मुख्य आश्रयस्थान, की ज्यांच्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते, त्या सज्जनांना मी वंदन करतो. (१)
जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ ।
तेंचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २॥
परब्रह्मप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे. पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे. हा अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे संतसंगती. (२)
वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे ।
नाना साधनीं सायासें । न पडे ठाईं ॥ ३॥
परब्रह्म वास्तविक प्रगटच आहे. पण अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही. कारण त्याचा शोध घेऊ गेले असता ते कुठे आढळूनच येत नाही. (३)
जेथें परिक्षवंत ठकले । नांतरी डोळसचि अंध जाले ।
पाहात असताअंचि चुकले । निजवस्तूसी ॥ ४॥
अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात. डोळसांनाही आत्मवस्तु दिसत नाही. तेही चुकतात, म्हणजेच डोळे असूनही आंधळे ठरतात. (४)
हें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना ।
नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५॥
दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तु दिसत नाही. एवढेच नव्हे तर डोळ्यांत नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती दृष्टीपुढे येत नाही. (५)
सोळां कळी पूर्ण शशी । दाखवू शकेना वस्तूसी ।
तीव्र आदित्य कळारासी । तोहि दाखवीना ॥ ६॥
सोळा कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रसुद्धा ती दाखविण्यास समर्थ नाही. एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूस दाखवू शकत नाही. (६)
जया सुर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे ।
नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥ ७॥
कोळ्याच्या अंगांतून बाहेर पडणारा अति सूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो, तसेच अणुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्यप्रकाशाच्या योगे आपण पाहू शकतो. (७)
चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी । परी तो दाखवीना वस्तूसी ।
तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥
एवढेच कशाला, केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते, पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही, पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते. (८)
जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले ।
जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ।
आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की, तेथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात. प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, तर्काने ती जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात. (९)
वळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी ।
जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥
विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो, शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करू जावे तर शब्दांचीच बोबडी वळते व मनाने जाणू जावे, तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही. (१०)
जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष ।
तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥ ११॥
शेषास सहस्त्र मुखे असल्यामुळे वक्त्यांमध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे, पण तोही वर्णन करून थकला, तरी त्याला निजवस्तूचे वर्णन करता आले नाही. (११)
वेदे प्रकाशिलें सर्वही । वेदविरहित कांहीं नाहीं ।
तो वेद कोणासही । दाखवूं सकेना ॥ १२॥
वेदांत सर्व वस्तूंचे वर्णन आढळते. त्यांत ज्या वस्तूचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते; पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तु दाखवू शकत नाही. (१२)
तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे ।
त्याचा महिमा वचनीं सांगे । ऐसा कवणु ॥ १३॥
अशी सर्वप्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तु ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते, त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दांत कसा बरे वर्णन करता येईल ? (१३)
विचित्र कळा ये मायेची । परी वोळखी न संगवे वस्तूची ।
मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४॥
मायेचे अंगी अनेक विचित्र कळा असल्या, तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे. अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल, त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात. (१४)
वस्तूसी वर्णिलें नवचे । तेंचि स्वरूप संतांचें ।
या कारणे वचनाचें । कार्य नाही ॥ १५॥
ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही, त्याप्रमाणेच संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही. कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही. (१५)
संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।
नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६॥
संत हे परमानंदरूप असतात, सुखरूप असतात. एवढेच नव्हे, तर नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते. (१६)
संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती ।
नांतरी भक्तीची फळश्रुती । ते हे संत ॥ १७॥
संत हे विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात. (१७)
संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचें सत्पात्र ।
नांतरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥ १८॥
संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्पात्र असतात; अथवा जेथे पुण्यच उदयास येते, अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय. (१८)
संत समाधीचें मंदिर । संत विवेकाचें भांडार ।
नांतरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥ १९॥
संत म्हणजे समाधीचे मंदिरच, विवेकाचे भांडारच आणि सायुज्य मुक्तीचे माहेरघरच असतात. (१९)
संत सत्याचा निश्चयो । संत सार्थकाचा जयो ।
संतप्राप्तीचा समयो । सिद्धरूप ॥ २०॥
संत सत्याचा कधीही त्याग करीत नाहीत. संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो ज्यावेळी आत्मवस्तुप्राप्तीची वेळ येते, त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते. (२०)
मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत ।
जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१॥
संतांजवळ मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असते. या शाश्वत संपत्तीने ते वैभवसंपन्न असतात. एवढेच नव्हे, तर असंख्य दरिद्री जीवांना मोक्षलक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभवसंपन्न करून सोडतात. (२१)
जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दानशूर ।
तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२॥
संत अत्यंत सामर्थ्यसंपन्न व उदारवृत्तीचे असतात. ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील ? (२२)
माहांराजे चक्रवर्ती । जाले आहेत पुढें होती ।
परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३॥
जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत. सध्या आहेत व पुढेही होतील, पण त्यातील कोणीही सायुज्यमुक्ती देऊ शकत नाहीत. (२३)
जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन ।
तयां संतांचें महिमान । काय म्हणौनी वर्णावें ॥ २४॥
हे सायुज्यमुक्तीचे दान त्रैलोक्यात संतसज्जनांशिवाय कुणी देऊच शकत नाही. ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी ? (२४)
जें त्रैलोक्याहून वेगळें । जें वेदश्रुतीसी नाकळे ।
तेंचि जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥ २५॥
जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहे, जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही, असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकाच्या अंतःकरणात प्रगट होते. (२५)
ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा ।
जयांचेनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६॥
असा हा संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या, तरी त्या अपुर्‍याच पडतात. संतांच्या मुळेच मुख्य परमात्मा प्रगट होतो. (२६)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
संतस्तवननाम समास पांचवा ॥ ५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘संतस्तवननाम’ समास पाचवा समाप्त.

समास सहावा : श्रोतेजनस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन ।
विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १॥
येथे जे श्रोतेजन बसले आहेत त्यांना मी वंदन करतो. भक्त, ज्ञानी, संतसज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत. (१)
येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर ।
येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नांचे ॥ २॥
यांतील काही सत्त्वगुणांचा समुद्रच आहेत, तर कुणी बुद्धिमान आहेत. काही श्रोते नाना शब्दरत्‍नांची जणू खाणच आहेत. (२)
जे नाना अर्थांबृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते ।
नाना संशयातें छेदिते । निश्चै पुरुष ॥ ३॥
कुणी असे रसिक आहेत, की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद ते घेतात. तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात. काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात. (३)
ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार ।
नांतरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४॥
काहींची धारणाशक्ती अशी अपार आहे की,हे ईश्वराचेच अवतार आहेत. ते जेव्हां सभेत बसतात तेव्हा जणूं प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपाने सभेत उपस्थित आहेत, असे वाटते. (४)
किं हे ऋषेश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागळी ।
जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५॥
असे अत्यंत सात्त्विक व मूर्तिमंत शांतिस्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की, जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत शोभा आली आहे. (५)
हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे ।
साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६॥
वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात, त्यांच्या जिव्हेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य, नाट्यादी साहित्यप्रकारांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरू बृहस्पतीच बोलत आहेत. (६)
जे पवित्रपणें वैश्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर ।
ज्ञातेपणें दृष्टीसमोरे । ब्रह्मांड न ये ॥ ७॥
काही श्रोते अग्नीप्रमाणे पवित्र आहेत, तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्फुर्तिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत. काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही. (७)
जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान ।
सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८॥
काही अखंड सावधान आहेत, तर काही त्रिकाळज्ञानी आहेत, तर काही आत्मज्ञानी असून सर्वकाळ निरभिमानी आहेत. (८)
ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐंसें कांहींच नाहीं उरलें ।
पदार्थमात्रांसी लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९॥
ज्यांच्या दृष्टीखालून गेली नाही अशी वस्तूच जगात नाही, असे काही सर्वज्ञ आहेत. त्यांच्या मनाने पदार्थमात्रांस जाणून घेतलेले असते. (९)
जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वीच ठावें ।
तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १०॥
बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे, ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते. तेव्हां शहाणपणाचा आव आणून त्यांच्यासमोर बोलावे तरी काय, हेच कळत नाही. (१०)
परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक ।
भाग्यपुरुष काये येक । सेवीत नाहीं ॥ ११॥
परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात. ते जे समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात. म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे. (११)
सदा सेविती दिव्यान्नें । पालटाकारणें आवेट अन्नें ।
तैसींच माझीं वचनें । पराकृतें ॥ १२॥
जे सर्वदा दिव्यान्‍ने सेवन करतात, तेही रुचिपालटाकरिता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात, तशीच ते माझी प्राकृत वचने गोड मानून घेतील. (१२)
आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्वर ।
परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३॥
प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वरपूजन करावे असे सांगितले जाते, पण परमेश्वरपूजनच करू नये, हा विचार कुठेही सांगितलेला नाही. (१३)
तैसा मी येक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ ।
यांची पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४॥
त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वरस्वरूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो, तरी मला जमेल तशा ओबडधोबड शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे. (१४)
वित्पत्ती नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं ।
भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौल्यता नाहीं वचनाची ॥ १५॥
माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती, ज्ञान, वैराग्यादी गुण नाहीत, तसेच शब्दमाधुर्यही नाही. (१५)
ऐसा माझा वाग्विाळास । म्हणौन बोलतों सावकाश ।
भावाचा भोक्ता जगदीश । म्हणौनियां ॥ १६॥
माझा वाग्विलास हा असा आहे, पण जगदीश हा भावाचा भोक्ता असतो. हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेस प्रवृत्त झालो आहे. (१६)
तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथें माझी वित्पत्ती किती ।
बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ॥ १७॥
आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीच आहात. माझी व्युत्पत्ती ती किती ? मी मंदबुद्धीचा, मूळ असा आहे आणि तरी आपल्याशी सलगी करीत आहे. (१७)
समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याचा आंगीं ।
तुम्हां संतांचा सलगी । म्हणौनि करितों ॥ १८॥
एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला, तरी तो बापाची सलगी करू शकतो. तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे. (१८)
व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयाचकित लोक ।
परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढे खेळती ॥ १९॥
व्याघ्र-सिंहादी हिंस्त्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात. पण त्यांची पिल्ले निःशंक मनाने त्यांच्यापुढे खेळत असतात. (१९)
तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतांपासीं बोलत ।
तरी माझी चिंता तुमचे चित्त । वाहेलच कीं ॥ २०॥
त्याप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हांपाशी बोलत आहे. तुम्ही माझी निश्चितच काळजी वाहाल अशी मला खात्री आहे. (२०)
आपलेंची बोले वाउगें । त्याची संपादणी करणें लागे ।
परंतु काहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१॥
आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले, तर आईबापांना त्यास सांभाळून घ्यावेच लागते. सांभाळून घ्या अशी विनवणी त्यांना करावी लागत नाही. (२१)
हें तों प्रीतीचें लक्षण । स्वभावेंची करी मन ।
तैसे तुम्ही संतसज्जन । मायेबाप विश्वाचे ॥ २२॥
ते सांभाळून घेतात हे तर प्रेमाचे लक्षणच असते. ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात. तसेच तुम्ही संतसज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात. (२२)
माझा आशय जाणोनी जीवें । आतां उचित तें करावें ।
पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३॥
म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे, अशी आपल्या दासांचाही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे. (२३)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रोतेस्तवननाम समास सहावा ॥ ६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘श्रोतेजनस्तवननाम’ समास सहावा समाप्त.

समास सातवा : कवेश्वरस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।
नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥
आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो. ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दांच्या साहाय्याने नवी सृष्टीच उत्पन करतात किंवा कवी म्हणजे जणू वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय. (१)
कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन ।
नाना शब्दांचें भुवन । येथार्थ होये ॥ २॥
कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय. नाना कलांचा विकास कवींच्यामुळेच होतो. अनेक शब्दांचे घर म्हणजे कवी, असे म्हटले तरी ते योग्य ठरेल. (२)
कीं हे पुरुषार्थाचें वैभव । कीं हे जगदीश्वराचें महत्व ।
नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३॥
जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्त्व वाढविण्याचे कार्य नाना युक्त्या योजून, संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात. (३)
कीं हे शब्दरत्नाचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्त सरोवर ।
नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण जाले ॥ ४॥
कवी हे शब्दरत्‍नांचे सागर असतात. मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात. बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्तिस्थान कवीच असतात. या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखविण्यासाठीच जणू ते जन्मास येतात. (४)
अध्यात्मग्रंथांची खाणी । कीं हे बोलिके चिंतामणी ।
नाना कामधेनूचीं दुभणीं । वोळलीं श्रोतयांसी ॥ ५॥
कवी हे अध्यात्मग्रंथांची खाण असतात, चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते; पण तो अचेतन असतो. कवीही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्‍नांच्या साहाय्याने करून देतात. ते चेतन असतात, म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेतनूंनी स्रवलेल्या अमृतधारा असे समजावे. (५)
कीं हे कल्पनेचे कल्पतरु । कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु ।
नाना सायोज्यतेचे विस्तारु । विस्तारले ॥ ६॥
किंवा कवी म्हणजे कल्पिलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावाडीच आहेत किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहेत. (६)
कीं हा परलोकींचा निजस्वार्थु । कीं हा योगियांचा गुप्त पंथु ।
नाना ज्ञानियांचा परमार्थु । रूपासि आला ॥ ७॥
किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योगमार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रगट झाला आहे. (७)
कीं हे निरंजनाची खूण । कीं हे निर्गुणाची वोळखण ।
मायाविलक्षणाचे लक्षण । ते हे कवी ॥ ८॥
निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतलेच असते. कारण जेथे इंद्रिये, मन, बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दांत कशी वर्णन करणार ? पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात. (८)
कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ ।
नातरी होये सुल्लभ । निजबोध कविरूपें ॥ ९॥
कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या साहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोधरूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवींची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे. (९)
कवि मुमुक्षाचें अंजन । कवि साधकांचें साधन ।
कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १०॥
कवी हे मुमुक्षूंना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधनरूपच आहेत किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी. (१०)
कवि स्वधर्माचा आश्रयो । कवि मनाचा मनोजयो ।
कवि धार्मिकाचा विनयो । विनयकर्ते ॥ ११॥
कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे, तर मनोजय कसा करावा यांचेही मार्गदर्शन ते करतात म्हणून त्यांनाच येथे मनोजय म्हटले आहे; तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो, तोही एकप्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो म्हणून त्यांना येथे विनयकर्ते असे समर्थ म्हणत आहेत. (११)
कवि वैराग्याचें संरक्षण । कवि भक्तांचें भूषण ।
नाना स्वधर्मरक्षण । ते हे कवी ॥ १२॥
कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात म्हणजे याप्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवितात म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे. कवींमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात. म्हणून त्यांना स्वधर्मसंरक्षण असे म्हटले आहे. (१२)
कवि प्रेमळांची प्रेमळ स्थिती । कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ति ।
कवि उपासकांची वाड कीर्ती । विस्तारली ॥ १३॥
प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात, तर ध्यान कसे करावे यांचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्ट देवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास साहाय्य करतात. भक्तांची, उपासकांची श्रेष्ठ कीर्तीही कवींच्यामुळेच सर्वदूर पसरते. (१३)
नाना साधनांचे मूळ । कवि नाना प्रेत्नांचें फळ ।
नाना कार्यसिद्धि केवळ । कविचेनि प्रसादें ॥ १४॥
कवींच्यामुळेच लोकांना नाना साधनांची माहिती मिळते, काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते हे कळते, एवढेच नव्हे, तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यांत सिद्धी प्राप्त होते. (१४)
आधीं कवीचा वाग्विळास । तरी मग श्रवणीं तुंबळे रस ।
कविचेनि मतिप्रकाश । कवित्वास होये ॥ १५॥
कवींचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो, तर त्यांच्या श्रेष्ठप्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. (१५)
कवि वित्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंतांची सत्ता ।
कवि विचक्षणाची कुशळता । नाना प्रकारें ॥ १६॥
कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते, तर हुषार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. (१६)
कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना धाटी मुद्रा छंद ।
कवि गद्यपद्यें भेदाभेद । पदत्रासकर्ते ॥ १७॥
कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार धाटी, मुद्रा, छंद, प्रास उपयोगात आणतात, गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात. कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात. (१७)
कवि सृष्टीचा आळंकार । कवि लक्ष्मीचा शृंघार ।
सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवी ॥ १८॥
या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात, त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात; कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच होत आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धारही कवीश्वरच असतात. (१८)
कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण ।
नान सुखाचें संरक्षण । ते हे कवी ॥ १९॥
कवींमुळे सभा शोभून दिसते. ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षणरूपच असतात. (१९)
कवि देवांचे रूपकर्ते । कवि ऋषीचें महत्ववर्णिते ।
नाना शास्त्रांचें सामर्थ्य ते । कवि वाखाणिती ॥ २०॥
कवींमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्त्व वाढवितात व कवींमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात. (२०)
नस्ता कवीचा व्यापार । तरी कैंचा अस्ता जगोद्धार ।
म्हणौनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१॥
कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती, तर जगाचा उद्धार कसा बरे झाला असता ? म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहेत. (२१)
नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवेश्वरेंविण तों नाहीं ।
कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२॥
कवी नसते तर चौदा विद्या, विविध प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार व प्रसार कसा झाला असता ? म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञानप्रसारास कवीच कारणीभूत आहेत. (२२)
मागां वाल्मीक व्यासादिक । जाले कवेश्वर अनेक ।
तयांपासून विवेक । सकळ जनासी ॥ २३॥
पूर्वी वाल्मीकी, व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. (२३)
पूर्वीं काव्यें होतीं केलीं । तरीच वित्पत्ती प्राप्त झाली ।
तेणे पंडिताआंगीं बाणली । परम योग्यता ॥ २४॥
त्यांच्यासारख्यांनी केलेली उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परम योग्यता प्राप्त झाली. (२४)
ऐसे पूर्वीं थोर थोर । जाले कवेश्वर अपार ।
आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५॥
असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो. (२५)
नाना चातुर्याच्या मूर्ती । किं हे साक्षात् बृहस्पती ।
वेद श्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६॥
हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच होय. अथवा वेद व श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात, असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. (२६)
परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें ॥
सेखीं बोलीले पूर्णपणें । संशयातीत ॥ २७॥
केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धान्त विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यांतून सांगतात. (२७)
कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसाचे वोघ लोटले ।
नाना सुखाचे उचंबळले । सरोवर हे ॥ २८॥
हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहेत. किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाहच आहेत किंवा नाना प्रकारच्या सुखांनी उचंबळून येणारी ही सरोवरे आहेत. (२८)
कीं हे विवेकनिधीचीं भांडारें । प्रगट जालीं मनुष्याकारें ।
नाना वस्तूचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९॥
कवींचे अंतरंग निरनिरळ्या वस्तूंच्या विचाराने भरले असते. म्हणून त्यांना मनुष्यरूपांनी प्रगटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ म्हणतात. (२९)
कीं हे आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदार्थास आणी उणें ।
लाधलें पूर्व संचिताच्या गुणें । विश्वजनासी ॥ ३०॥
किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून, जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरविणारी ही ठेव, लोकांना त्यांच्या पूर्वपुण्यसंचयानेच प्राप्त झालेली असते. (३०)
कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदे उतटलीं ।
विश्वजनास उपेगा आलीं । नाना प्रयोगाकारणे ॥ ३१॥
कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची ‘जहाजेच’ असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगांसाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत. (३१)
कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती ।
नांतरी भक्तीची फळश्रुती । फळास आली ॥ ३२॥
कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगस्थितीच आहे किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आली आहे. (३२)
कीं हा ईश्वराचा पवाड । पाहातां गगनाहून वाड ।
ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंदरचना ॥ ३३॥
किंवा आकाशाहूनही विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे. किंवा या विशाल ब्रह्मांडरचनेहूनही थोर अशी कवींची प्रबंधरचना आहे. (३३)
आतां असो हा विचार । जगास आधार कवेश्वर ।
तयांसी माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४॥
असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत, म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवितो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. (३४)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कवेश्वरस्तवननाम समास सातवा ॥ ७॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘कवेश्वरस्तवननाम’ समास सातवा समाप्त

समास आठवा : सभास्तवन

॥ श्रीराम ॥

आतां वंदूं सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा ।
जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठतु भरें ॥ १॥
श्री समर्थ म्हणतात की, आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो, जेथे मुक्ती अत्यंत सुलभ असते व जेथे स्वतः जगदीश प्रेमभराने तिष्ठत उभा असतो. (१)
श्लोक ॥ नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्‌भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥
नाहीं वैकुंठीचा ठाईं । नाहीं योगियांचा हृदईं ।
माझे भक्त गाती ठाईं ठाईं । तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ २॥
भगवान म्हणतात की, ‘नारदा, मी वैकुंठात, योग्यांच्या हृदयात (अथवा सूर्यबिंबामध्ये) राहात नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी कीर्ती गातात, तेथे मी उभा असतो. (२)
याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ ।
नामघोषें घडघडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३॥
असे स्वतः भगवंतांनी सांगितले असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून जयजयकार करून त्याची कीर्ती गात असतात, ती सभा श्रेष्ठ असून ती म्हणजेच खरे वैकुंठ होय. (३)
प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें ।
वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४॥
अशा सभेमध्ये प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत्-कथा, हरिकीर्तन, वेदांवरील व्याख्यान, तसेच पुराण-श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर चालू असतात. (४)
परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणाचे संवाद ।
अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथे ॥ ५॥
तेथे परमेश्वराचे गुणानुवाद गायले जातात. विविध विषयांवर सुंदर निरूपण केले जाते. तसेच अध्यात्मविद्येतील अनेक भेदांवर चर्चा केली जाते. (५)
नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकानिवृत्ती ।
चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विळासें ॥ ६॥
अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका-कुशंका तसेच तर्क-कुतर्कांचे समाधानकारक निरसन केले जाते. त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते. अशाप्रकारे व्याख्यान- प्रवचनादिकांमुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इष्टदैवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते. (६)
भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्त्विक ।
रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७॥
अशा सभेत प्रेमळ भाविक भक्त, गंभीर वृत्तीचे सभ्य सात्त्विक लोक, तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित येतात. (७)
कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ ।
सुचिस्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८॥
या सभेत कर्मनिष्ठ आचारनिष्ठ, दानशील धर्मनिष्ठ, पवित्र आचरणाचे पुण्यशील व ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे व जे कृपाळू आहेत असे लोक संमिलित होतात. (८)
योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस ।
विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९॥
दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी ।
येक बाळब्रह्मचारी । योगेश्वर ॥ १०॥
तेथे योगी, वैराग्ययुक्त, उदासीन, नियमनिष्ठ निग्रही, तापसी, विरक्त, निःस्पृह बराच काळ अरण्यात राहाणारे दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे वैष्णव, तर कुणी बालब्रह्मचारी वा योगी असे नाना प्रकारचे लोक येतात. (९-१०)
पुरश्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी ।
माहायोगी आणी जनस्वी । जनासारिखे ॥ ११॥
कुणी पुरश्चरण करणारे तर कुणी तपस्वी, कुणी तीर्थक्षेत्रात राहाणारे, तर कुणी मनाचा निग्रह करणारे, कुणी महायोगी तर जनात राहून जनांवर स्वामित्व गाजविणारे, लोकांचे श्रद्धास्थान असणारे असतात. (११)
सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक ।
येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२॥
सिद्ध, साधू, साधक, मंत्र-यंत्र करून देणारे कुणी एकनिष्ठ उपासक, तर कुणी गुणग्राही असतात. (१२)
संत सज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन ।
प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते ॥ १३॥
येथे संत, सजन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, ज्ञानी, सर्वज्ञ, तर कुणी शुद्ध समाधान करणारे असतात. (१३)
योगी वित्पन्न ऋषेश्वर । धूर्त तार्किक कवेश्वर ।
मनोजयाचे मुनेश्वर । आणी दिग्वल्की ॥ १४॥
योगी, विद्वान, ऋषीश्वर तर कुणी धूर्त, तार्किक, कवीश्वर मनोनिग्रही मुनिश्रेष्ठ, तर काही दिगंबरही असतात. (१४)
ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी । तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी ।
योगाभ्यासी योगज्ञानी । उदासीन ॥ १५॥
ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्त्वज्ञानी, पिंडज्ञानी योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन असे नाना प्रकारचे लोक असतात. (१५)
पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक ।
भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६॥
कुणी पंडित तर कुणी पुराणिक तर कुणी विद्वान तर कुणी वैदिक, भट पाठक, यजुर्वेदी इत्यादी नाना लोक एकत्र येतात. (१६)
माहाभले माहाश्रोत्री । याज्ञिक आणी आग्नहोत्री ।
वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७॥
अती चांगले, महाश्रोत्री, याज्ञिक, अग्निहोत्री, वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकही असतात. (१७)
भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान ।
बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥ १८॥
काही भूत, भविष्य, वर्तमानकाळाचे ज्ञान असणारे त्रिकाल असतात, तर काही बहुश्रुत काही निरभिमानी व काही अगदी निरपेक्ष असतात. (१८)
शांति क्ष्मा दयासीळ । पवित्र आणी सत्वसीळ ।
अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्वरी पुरुष ॥ १९॥
शांती, क्षमा, दयाशील पवित्र, सत्त्वशील, शुद्ध अंतःकरणाचे, ज्ञाननिष्ठ जणू ईश्वरी अवतार असेही काही असतात. (१९)
ऐसे जे कां सभानायेक । जेथें नित्यानित्यविवेक ।
त्यांचा महिमा अलोलिक । काय म्हणोनि वर्णावा ॥ २०॥
अशा प्रकारचे जे सभानायक असतात, जेथे नित्यानित्य विवेक असतो, त्यांचा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल ? (२०)
जेथें श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये ।
तेथें जनासी तरणोपाये । सहजचि होये ॥ २१॥
जेथे असा परमार्थसमुदाय असतो त्या सभेत श्रवणाचा लाभ घडला, तर सामान्य लोकांनाही भवसागर तरून जाण्याचा उपाय अगदी सहज प्राप्त होतो. (२१)
उत्तम गुणाची मंडळी । सत्वधीर सत्वागळी ।
नित्य सुखाची नव्हाळी । जेथें वसे ॥ २२॥
अशा सभेत सर्व उत्तम गुणांची मंडळी, सत्त्वशील, सत्त्वनिष्ठ एकत्र जमतात, त्यामुळे तेथे नित्य सुखप्राप्तीच होते. (२२)
विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सत्पात्रें ।
भगवंताचीं प्रीतिपात्रें । मिळालीं जेथें ॥ २३॥
तेथे विद्यासंपन्न, कलासंपन्न, विशेष गुणसंपन्न व भगवंतास अत्यंत प्रिय असणारे लोक एकत्रित येतात. (२३)
प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी ।
गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४॥
प्रवृत्त, निवृत्त, प्रपंची, परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थी आणि संन्यासी तेथे असतात. (२४)
वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ ।
अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामीं ॥ २५॥
तेथे वृद्ध, तरुण, बाल, स्त्रिया, पुरुष आदी सर्वच श्याम-वर्ण भगवान विष्णूचे हृदयात अखंड ध्यान करतात. (२५)
ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन ।
जयांचेनि समाधान । अकस्मात बाणें ॥ २६॥
असे जे परमेश्वराला प्रिय असणारे लोक आहेत, त्यांना मी अभिवंदन करतो. त्यांच्या सहवासाने तत्काळ समाधान मिळून ते स्थिर होते. (२६)
ऐंसिये सभेचा गजर । तेथें माझा नमस्कार ।
जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७॥
जेथे नित्य निरंतर भगवंताच्या कीर्तनाचा गजर होत असतो, अशा सभेस माझा नमस्कार असो. (२७)
जेथें भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती ।
ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं । महंत बोलिले ॥ २८॥
जेथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्तिस्वरूप सत्पुरुष असतात, तेथे गेले असता सहजच उत्तम गती प्राप्त होते, असे अनेक संत-महंतांनी अनेक ग्रंथांतून ठामपणे सांगितले आहे. (२८)
कल्लौ कीर्तन वरिष्ठ । जेथें होय ते सभा श्रेष्ठ ।
कथाश्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९॥
कलियुगात हरिकीर्तन हेच सर्वोत्कृष्ट साधन असून जेथे हरिकीर्तन होते, तीच सभा श्रेष्ठ होय. तेथील श्रवणाने नाना प्रकारचे वाईट संदेह नाहीसे होतात. (२९)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सभास्तवननाम समास आठवा ॥ ८॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे
‘सभास्तवननाम’ समास आठवा समाप्त.

समास नववा : परमार्थस्तवन

॥ श्रीराम ॥

आतां स्तऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ ।
नांतरी समर्थामध्ये समर्थ । योग हा ॥ १॥
आता परमार्थाचे गुणवर्णन करून सांगतो. कारण परमार्थ हेच साधकांचे मुख्य ध्येय असून मानवी जीवनात सर्वोत्तम समर्थ योग परमार्थच आहे. (१)
आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम ।
कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २॥
खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संत-समागम केला तर त्याची सहज प्राप्ती होते; पण लोकांना हे मर्म कळत नाही. त्यामुळे त्यांना तो अति दुर्गम वाटतो. (२)
नाना साधनांचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार ।
वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३॥
परब्रह्मप्राप्तीची अनेक साधने आहेत, पण त्यांचे फल कालांतराने मिळते; पण संतसमागम हा रोकडा व्यवहार आहे. म्हणजे त्याने ब्रह्मसाक्षात्कार हे फळ तत्काळ मिळते. वेदशास्त्रांचे जे सार तो ब्रह्मसाक्षात्कार तत्काळ अनुभवास येतो. (३)
आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे ।
उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥ ४॥
तसे पाहिले तर परमार्थ म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून राहिले आहे, पण पाहावयास गेले तर अणुमात्रही दृष्टीस पडत नाही. सर्वसंगपरित्याग करून एकांतात राहून प्रयत्न केला तरी ते दिसत नाही. (४)
आकाशमार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ ।
इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५॥
जे योगी असतात, तेच सुषुम्ना नाडीद्वारे षट्चक्रे भेदून हृदयाकाशमार्गाने गुप्तपणे स्वस्वरूपदर्शन करू शकतात. त्यांच्या ठिकाणीच या मार्गाचे ज्ञान व तो आक्रमण्याची क्षमता असते. सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही. (५)
साराचेंहि निजसार । अखंड अक्षै अपार ।
नेऊं न सकती तश्कर । कांही केल्या ॥ ६॥
परमार्थ हा सर्व साराचेही निजसार असून तो अखंड, अक्षय व अपार असा परब्रह्मस्वरूपच असतो. त्यास कुणी चोरू शकत नाही. (६)
तयास नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये ।
अथवास्वापदभये । बोलोंच नये ॥ ७॥
त्यास राजभय नाही, अग्निभय नाही अथवा श्वापदभय नाही. असल्या भयाची गोष्टच कुणी बोलू नये. (७)
परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावही चुकेना ।
काळांतरी चळेना । जेथीचा तेथें ॥ ८॥
परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही, तसेच दुसरे कुणीही त्याला हलवू शकत नाही, कितीही काळ गेला तरी ते आपले स्थान सोडत नाही. जिथल्या तिथे स्थिर असते. (८)
ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे ।
अथवा नव्हे आदिक उणें । बहुतां काळें ॥ ९॥
अशी ती अगदी स्वतःची खास ठेव आहे. त्यात कधीही परिवर्तन होत नाही, अथवा कितीही काळ लोटला तरी त्यात अधिक-उणे होत नाही. (९)
अथवा तें घसवटेना । अथवा अदृश्य होयेना ।
नांतरी पाहातां दिसेना । गुरु‍अंजनेविण ॥ १०॥
त्याचप्रमाणे ते झिजतही नाही वा अदृश्यही होत नाही. पण असे असून गुरुकृपेच्या अंजनाशिवाय पाहू गेले तर ते दिसतही नाही. (१०)
मागां योगिये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ ।
यासि बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥ ११॥
पूर्वीही जे सामर्थ्यसंपन्न योगी होऊन गेले, त्यांचाही निजस्वार्थ परमार्थ हाच होता. परमार्थ परम गुप्त असतो, म्हणूनच त्यास परमार्थ म्हणतात. (११)
जेंही शोधून पाहिला । त्यासी अर्थ सांपडला ।
येरां असोनी अलभ्य जाला । जन्मोजन्मीं ॥ १२॥
ज्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याची प्राप्ती झाली. जे असा प्रयत्नच करीत नाहीत त्यांना तो जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी त्याची प्राप्ती होत नाही. (१२)
अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्याची ।
आणी पदवी सायोज्यतेची । सन्निधचि लाभें ॥ १३॥
हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्ममृत्यूची वार्ताही नसते. उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते. (१३)
माया विवेकें मावळे । सारासारविचार कळे ।
परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४॥
सारासार विवेकामुळे मायेचे पटल नाहीसे होते व अंतर्यामी परब्रह्माचा साक्षात्कार होतो. (१४)
ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड ।
पंचभूतांचें थोतांड । तुछ्य वाटे ॥ १५॥
सर्वत्र ते ब्रह्मच व्यापून आहे अशी अनुभूती येऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते. आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो. (१५)
प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका ।
शुद्ध आत्मा विवेका- । अंतरीं आला ॥ १६॥
प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते व विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रगट होते. (१६)
ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरीं ।
दृश्याची जुनी जर्जरी । कुहिट जाली ॥ १७॥
अंतरंगात स्वस्वरूपानुभव आला म्हणजे संशय कुठल्याकुठे नाहीसा होतो. हे सर्व दृश्य विश्व जुनाट फाटलेले, विटलेले वाटू लागते. (१७)
ऐसा हा परमार्थ । जो करी त्याचा निजस्वार्थ ।
आतां या समर्थास समर्थ । किती म्हणौनि म्हणावें ॥ १८॥
परमार्थ हा असा आहे. जो करील त्याच्या जन्माचे सार्थक होते. हा इतका श्रेष्ठ, थोर व उत्तमोत्तम आहे की, याची प्रशंसा तरी किती करावी ? (१८)
या परमार्थाकरितां । ब्रह्मादिकांसि विश्रामता ।
योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९॥
या परमार्थामुळेच ब्रह्मादी देवांना विश्रांती लाभते. त्याच्या योगानेच योगी परब्रह्माशी तादात्म्याचा अनुभव घेतात. (१९)
परमार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु माहानुभावां ।
सेखीं सात्विक जड जीवां । सत्संगेंकरूनी ॥ २०॥
सिद्ध, साधू, महानुभाव इत्यादी सर्वांना परमार्थामुळेच विसावा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर सामान्य जड पण सात्त्विक जीवांनाही संतसंगतीने हा लाभ मिळू शकतो. (२०)
परमार्थ जन्माचें सार्थक । परमार्थ संसारीं तारक ।
परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकासी ॥ २१॥
परमार्थामुळेच मनुष्यजन्माचे सार्थक होते. जीव परमार्थामुळेच संसारातून तरून जातो. धार्मिकांना परमार्थामुळेच परलोकात उत्तम गती प्राप्त होते. (२१)
परमार्थ तापसांसी थार । परमार्थ साधकांसी आधार ।
परमार्थ दाखवी पार । भवसागराचा ॥ २२॥
तपस्वी लोकांचा परमार्थच आश्रयदाता आहे. साधकांना परमार्थच आधार असून त्याच्या योगेच या भवसागरातून पैलतीरास जाता येते. (२२)
परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी ।
या परमार्थाची सरी । कोणास द्यावी ॥ २३॥
जो परमार्थ करतो तोच खरा श्रीमंत होय व जो परमार्थ करीत नाही तोच खरा भिकारी ! अशा या परमार्थाची तुलना तरी कुणाबरोबर करावी ? (२३)
अनंत जन्मींचें पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे ।
मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ २४॥
अनंत जन्मांची पुण्याई गाठी असेल तरच मनुष्याकडून परमार्थ घडतो. परमार्थामुळे आपल्या अंतरातच आपणास मुख्य परमात्मा अनुभवास येतो. (२४)
जेणें परमार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थक केला ।
येर तो पापी जन्मला । कुलक्षयाकारणें ॥ २५॥
ज्याने कुणी परमार्थाचे हे श्रेष्ठत्व जाणले असेल त्याचाच जन्म खरोखरी सार्थकी लागतो. इतर जे त्याचे महत्त्व जाणत नाहीत, ते लोक पापी असून केवळ कुलक्षयाकरिताच जन्मास येतात. (२५)
असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा सीण ।
त्य मूर्खाचें मुखावलोकन । करूंच नये ॥ २६॥
असो. भगवत्प्राप्तीसाठी प्रयत्न न करता जो केवळ संसारासाठी कष्ट उपसतो, अशा मूर्ख माणसाचे तोंडही पाहू नये. (२६)
भल्यानें परमार्थीं भरावें । शरीर सार्थक करावें ।
पूर्वजांस उद्धरावें । हरिभक्ती करूनी ॥ २७॥
चांगल्या माणसाने हा मनुष्यदेह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्याने भगवद्‌भक्ती करून स्वतःचा व पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा. (२७)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
परमार्थस्तवननाम समास नववा ॥ ९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘परमार्थस्तवननाम’ समास नववा समाप्त.

समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण

॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ।
जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १॥
खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य आहे. कारण याची अपूर्वता अशी आहे की, या देहात परमार्थाचा जो जो छंद लागेल तो तो सिद्धीस जातो. (१)
या नरदेहाचेनि लागवेगें । येक लागले भक्तिसंगें ।
येकीं परम वीतरागें । गिरिकंदरें सेविलीं ॥ २॥
या नरदेहाच्या योगे कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगरकपारीत एकांतात जाऊन राहातात. (२)
येक फिरती तिर्थाटणें । येक करिती पुरश्चरणें ।
येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३॥
कुणी तीर्थयात्रा करतात, तर कुणी पुरश्चरणे करतात. काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात. (३)
येक तपें करूं लागले । येक योगाभ्यासी माहाभले ।
येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्री वित्पन्न ॥ ४॥
कुणी तपाचरण करतात, तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात. कुणी अभ्यास करून वेदशास्त्रांत पारंगत होतात. (४)
येकीं हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला ।
येकीं देह ठाईं पाडिला । भावार्थबळें ॥ ५॥
कुणी हठयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात, तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागीच देवाचा साक्षात्कार करून घेतात. (५)
येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात ।
येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥ ६॥
कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात, तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळवितात. कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात. (६)
येक तेजीं तेजचि जाले । येक जळीं मिळोन गेले ।
येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरूपीं ॥ ७॥
कुणी तेजोरूप होऊन तेजात विलीन होतात, तर कुणी जळात विरघळून जातात. कुणी पवनजय करून वायुरूप होऊन एकाएकी अदृश्य होतात. (७)
येक येकचि बहुधा होती । येक देखतचि निघोनि जाती ।
येक बैसले असतांची भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८॥
कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात, तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात. कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी, समुद्रादी ठिकाणीही फिरून येतात. (८)
येक भयानकावरी बैसती । एक अचेतनें चालविती ।
येक प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी ॥ ९॥
कुणी व्याघ्रादी हिंस्त्र पशूवर स्वार होतात, तर कुणी जड भिंती इत्यादीही चालवितात. कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसासही जिवंत करतात. (९)
येक तेजें मंद करिती । येक जळें आटविती ।
येक वायो निरोधिती । विश्वजनाचा ॥ १०॥
कुणी तेजाला मंद करतात, तर कुणी जलाशय कोरडे करतात, तर कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. (१०)
ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्धी ।
ऐसे सिद्ध लक्षावधी । हो‍ऊन गेले ॥ ११॥
कोणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवितात. असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत. (११)
येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध । येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध ।
ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध । विख्यात जाले ॥ १२॥
कुणी मनोसिद्ध असतात म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीस जातो, तर कुणी वाचासिद्ध असतात म्हणजे ते जे बोलतात ते तत्काळ खरे होते. कुणी अल्पसिद्ध म्हणजे लहानसहान सिद्धी प्राप्त केलेले असतात, तर कुणी सर्वसिद्ध म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले असतात. असे नाना प्रकारचे सिद्धपुरुष कीर्ती मिळवून गेले आहेत. (१२)
येक नवविधाभक्तिराजपंथें । गेले, तरले परलोकींच्या निजस्वार्थें ।
येक योगी गुप्तपंथें । ब्रह्मभुवना पावले ॥ १३॥
कुणी नवविधाभक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरून गेले व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी जन्म सार्थकी लावला. कुणी योगी सुषुम्नेच्या गुप्तमार्गाने ब्रह्मलोकास गेले. (१३)
येक वैकुंठास गेले । येक सत्यलोकीं राहिले ।
येक कैळासीं बैसले । शिवरूप हो‍ऊनी ॥ १४॥
कुणी वैकुंठास गेले, कुणी सत्यलोकात राहिले तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले. (१४)
येक इंद्रलोकीं इंद्र जाले । येक पितृलोकीं मिळाले ।
येक ते उडगणी बैसले । येक ते क्षीरसागरी ॥ १५॥
कुणी इंद्रलोकी इंद्र झाले, तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला. कुणी नक्षत्रमंडळात जाऊन बसले, तर कुणी क्षीरसागरात जाऊन राहिले. (१५)
सलोकता समीपता । स्वरूपता सायोज्यता ।
या चत्वार मुक्ती तत्वतां । इच्छा से‍ऊनि राहिले ॥ १६॥
सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या चार मुक्तींपैकी ज्याला ज्या मुक्तीची इच्छा होती, त्याप्रमाणे ती ती मुक्ती त्यांनी मिळविली. (१६)
ऐसे सिद्ध साधू संत । स्वहिता प्रवर्तले अनंत ।
ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणौन वर्णावा ॥ १७॥
याप्रमाणे या नरदेहाच्या साह्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले. सिद्ध, साधू, संत यांची अशी अनंत उदाहरणे आहेत. म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे ? (१७)
या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें ।
मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ १८॥
या नरदेहायोगे नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासारविचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत. (१८)
या नरदेहाचेनि संमंधें । बहुत पावले उत्तम पदें ।
अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ॥ १९॥
या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम पदे मिळविली. देहाची अहंता सोडून स्वस्वरूपानुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झाले (१९)
नरदेहीं ये‍ऊन सकळ । उधरागती पावले केवळ ।
येथें संशयाचें मूळ । खंडोन गेलें ॥ २०॥
या नरदेहात आल्यावर विवेकाच्या साहाय्याने सर्व संशयांचे निरसन झाल्याने अनेकांना सद्‌गतीचा लाभ झाला आहे. (२०)
पशुदेहीं नाहीं गती । ऐसे सर्वत्र बोलती ।
म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१॥
पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात, म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. (२१)
संत महंत ऋषी मुनी । सिद्ध साधू समाधानी ।
भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२॥
तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी ।
शडदर्शनी तापसी । नरदेहींच जाले ॥ २३॥
संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्त्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर संन्यासी, षड्दर्शनी, तापसी यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली. (२२-२३)
म्हणौनी नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ ।
जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचें ॥ २४॥
म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेहच सर्वांत श्रेष्ठ आहे, कारण या देहातच यमयातनारूपी अरिष्ट चुकविण्याची संधी प्राप्त होते. (२४)
नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन ।
परंतु हा परोपकारीं झिजऊन । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५॥
नरदेह सहसा पराधीन असत नाही, स्वाधीनच असतो. म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्तिरूपे उरवावा. (२५)
अश्व वृषभ गाई म्हैसी । नाना पशु स्त्रिया दासी ।
कृपाळूपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील ॥ २६॥
घोडा, बैल, गाई, म्हशी, इतर नाना पशू व स्त्रिया, विशेषतः दासी यांना जर कृपाळूपणे मोकळे सोडले, तर त्यांना कुणीही धरून नेईल. (२६)
तैसा नव्हे नरदेहो । इछा जाव अथवा रहो ।
परी यास कोणी पाहो । बंधन करूं सकेना ॥ २७॥
पण पुरुषदेहाची स्थिती तशी नाही. त्याची इच्छा असेल, तर त्याने घरात राहावे वा बाहेर जावे, पण त्याला कुणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही. (२७)
नरदेह पांगुळ असता । तरी तो कार्यास न येता ।
अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये ॥ २८॥
नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही. अथवा तो थोटा असेल तरी त्याने परोपकार करता येत नाही. (२८)
नरदेह अंध असिला । तरी तो निपटचि वायां गेला ।
अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९॥
नरदेह आंधळा असेल तर तो पूर्णपणे वायाच जातो. अथवा बहिरा असेल तर श्रवण-निरूपणाच्या उपयोगी पडत नाही. (२९)
नरदेह असिला मुका । तरी घेतां न ये आशंका ।
अशक्त रोगी नासका । तरी तो निःकारण ॥ ३०॥
नरदेह मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यांचे निरसन होत नाही किंवा तो अशक्त, रोगी, किंवा सडलेला असेल तरी तो कुचकामाचा ठरतो. (३०)
नरदेह असिला मूर्ख । अथवा फेंपया समंधाचें दुःख ।
तरी तो जाणावा निरार्थक । निश्चयेंसीं ॥ ३१॥
नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल अथवा त्याला फेफरे अथवा समंधाची बाधा वगैरे असेल तरी तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा. (३१)
इतकें हें नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग ।
तेणें धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥ ३२॥
इतकी ही व्यंगे नसून चांगला आरोग्यसंपन्‍न, धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थमार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. (३२)
सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्ले ।
तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ॥ ३३॥
उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असताही जे परमार्थबुद्धी विसरतात, ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमतात अर्थात फिरून जन्ममरणाच्या चक्रात सापडतात. (३३)
मृत्तिका खाणोन घर केलें । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें ।
परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४॥
जमीन खणून लोक घर बांधतात व हे आपले घर अशी दृढ समजूत करून घेतात, पण वास्तविक ते अनेकांचे असते, हे त्यांना कळत नाही. (३४)
मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें ।
मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३५॥
उंदीर म्हणतात हे घर आमचे आहे, पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे आहे. (३५)
कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें ।
मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३६॥
याप्रमाणेच कांतण्या, मुगळे मुंग्या घर आमचे आहे असे म्हणतात. (३६)
विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर ।
झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३७॥
विंचू सर्प, झुरळे घर आमचेच म्हणतात. (३७)
भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्या म्हणती आमुचें घर ।
आळीका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८॥
भुगे, भ्रमरीची अळी व किडे म्हणतात की, लाकडात आमचेच घर आहे. (३८)
मार्जरें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर ।
मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३९॥
मांजरे, कुत्री, मुंगसे इत्यादी प्राणी घर आपले आहे, असे म्हणतात. (३९)
पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर ।
पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४०॥
पुंगळ वाळ्या, पिसवा घर आमचे आहे असे म्हणतात. (४०)
ढेकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर ।
घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४१॥
ढेकूण, लाल मुंगळे, घुंगुर्डी देखील घर आमचे आहे असे म्हणतात. (४१)
पिसोळे म्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर ।
सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंवी ॥ ४२॥
पिसोळे, गांधील माश्या, सोट आणि गोमा हे सुद्धा घर आमचेच आहे असे म्हणतात. (४२)
बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार ।
समस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३॥
अशा प्रकारचे खूपसे किडे, त्यांचे किती म्हणून वर्णन करावे ? सर्वच म्हणतात की, निश्चित हे घर आमचेच आहे. (४३)
पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर ।
घरीचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४४॥
पशू दासी, घरातील माणसे सर्वच म्हणतात की घर आमचे आहे. (४४)
पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर ।
ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५॥
एवढेच नव्हे तर पाहुणे, मित्र, ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात. (४५)
तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर ।
आग्न म्हणती आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६॥
चोर, राजकीय अधिकारी, एवढेच नव्हे तर अग्नीही म्हणतो की घर माझे आहे. याला मी जाळून खाक करतो. (४६)
समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें ।
सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥
याप्रमाणे सर्वच म्हणतात की, घर माझे आहे. तसेच हा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे. शेवटी त्या घरचे ओझे होते व ते सोडून, किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागते. (४७)
अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली ।
मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥
याप्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर्व गावच ओस पडतो. अखेर त्या घरांतून अरण्यातील हिंस्र श्वापदे येऊन राहतात. (४८)
किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक ।
हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥
वास्तविक ते घर किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचेच असते. ‘माझे-माझे’ म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. (४९)
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती ।
जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥
घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास ‘माझे-माझे’ म्हणतो ते खरे नसते, असा अनुभवही येतो; म्हणून जन्म म्हणजे या जगातील दोन दिवसांची वस्ती आहे, हे जाणून ती कुठे तरी करावी. (अर्थात कुठल्याही जागेची आसक्ती धरू नये). (५०)
देह म्हणावें आपुलें । तरी हें बहुतांकारणें निर्मिलें ।
प्राणीयांच्या माथां घर केलें । वा मस्तकीं भक्षिती ॥ ५१॥
आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते की, हा देह आपण आपला म्हणतो पण तेही खरे नाही. हा देही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्याचे डोके खातात. (५१)
रोमेमुळी किडे भक्षिती । खांडुक जाल्यां किडे पडती ।
पोटामध्ये जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२॥
रोमरंध्राच्या मुळाशी राहून किडे मांस खातात, कुठे खांडक झाले तर त्यातही किडे पडतात. पोटात जंत होतात. हे तर आपण पाहतोच. (५२)
कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी ।
कीड लागे कर्णासी । आणी गोमाशा भरती ॥ ५३॥
दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते, कानांना कीड लागली की तेथे गोमाशा गर्दी करतात. (५३)
गोचिड अशुद्ध सेविती । चामवा मांसांत घुसती ।
पिसोळे चाऊन पळती । अकस्मात ॥ ५४॥
गोचिडी रक्त पितात, चामवा मांसात घुसतात, तर पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात. (५४)
भोंगें गांधेंलें चाविती । गोंबी जळवा अशुद्ध घेती ।
विंचू सर्प दंश करिती । कानटें फुर्सीं ॥ ५५॥
भुंगे व गांधीलमाशा चावतात. तर गोमा आणि जळवा रक्त पितात. विंचू, साप, कानटे व फुरशी दंश करतात. (५५)
जन्मून देह पाळिलें । तें अकस्मात व्याघ्रें नेलें ।
कां तें लांडगींच भक्षिलें । बळात्कारें ॥ ५६॥
जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा, तर अकस्मात वाघ त्यास उचलून नेतो किंवा बळजबरीने मारून लांडगाच त्यास खाऊन टाकतो. (५६)
मूषकें मार्जरें दंश करिती । स्वानें अश्वें लोले तोडिती ।
रीसें मर्कटें मारिती । कासावीस करूनी ॥ ५७॥
उंदीर मांजर त्याला दंश करतात. कुत्री, घोडे वगैरे त्याचे लचके तोडतात, तर अस्वले, माकडे कासावीस करून मारतात. (५७)
उष्टरें डसोन इचलिती । हस्थी चिर्डून टाकिती ।
वृषभ टोचून मारिती । अकस्मात ॥ ५८॥
उंट चावून उचलून फेकून देतात तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात. (५८)
तश्कर तडतडां तोडिती । भूतें झडपोन मारिती ।
असो या देहाची स्थिती । ऐसी असे ॥ ५९॥
चोर तडतड शरीराचे तुकडे करतात, तर भुते अंगात संचार करून मारतात. असो. या देहाची स्थिती अशी आहे. (५९)
ऐसें शरीर बहुतांचें । मूर्ख म्हणे आमुचें ।
परंतु खाजें जिवांचें । तापत्रैं बोलिलें ॥ ६०॥
या दृष्टीने विचार केला, तर हा देह पुष्कळांचा आहे; पण मूर्ख माणूस त्यास ‘माझा’ असे समजतो. वास्तविक ते अनेक जीवांचे भक्ष्य आहे. तापत्रय वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे. (६०)
देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें ।
नाहीं तरी हें वेर्थची गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ॥ ६१॥
नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते; नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो मृत्यू पावतो. (६१)
असो जे प्रपंचिक मूर्ख । ते काये जाणती परमार्थसुख ।
त्या मूर्खांचें लक्षण कांहीं येक । पुढे बोलिलें असे ॥ ६२॥
असो. जे प्रापंचिक सुखात गढलेले मूर्ख लोक असतात, ते परमार्थाचे सुख काय जाणार ? अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत. (६२)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नरदेहस्तवननिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘नरदेहस्तवननिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक पहिला समाप्त ॥

श्रीमत् दासबोध

दशक दुसरा : मूर्खलक्षणाचा समास पहिला : मूर्खलक्षण श्रीराम

ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना ।
कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १ ॥

श्री समर्थ म्हणतात की ओंकारस्वरूप, एकदंत व त्रिनयन अशा गजाननाला मी नमन करतो. ”हे गजानना, तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे” अशी विनंती आहे. (१)

तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्मसुते ।
अंतरी वसे कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥

वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी श्री शारदा तिला वंदन करून तिने आपल्या अंतरी स्फूर्तिरूपाने राहावे, अशी मी तिला प्रार्थना करतो. (२)

वंदून सद्गुरुचरण । करून रघुनाथस्मरण ।
त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥ ३ ॥

नंतर सद्‌गुरुचरणांना वंदन करून व श्रीरामस्मरण करून समर्थ म्हणतात की, लोकांनी सोडून द्यावीत, म्हणून मी आता मूर्खांची लक्षणे वर्णन करतो. (३)

येक मूर्ख येक पढतमूर्ख । उभय लक्षणीं कौतुक ।
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ ४ ॥

मूर्खांचे दोन प्रकार असतात. काही मूर्ख तर काही पढतमूर्ख असतात. कौतुक म्हणून मी दोन्हींचे वर्णन करीत आहे. श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे. (४)

पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण ।
साअवध हो‍ऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५ ॥

पढतमूर्खाची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत. ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी. (५)

आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार ।
परि कांहीं येक तत्पर । हो‍ऊन ऐका ॥ ६ ॥

मूर्खाची लक्षणें सांगावयाची म्हटली, तर ती अपार आहेत. आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत. श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी. (६)

जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान ।
जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७ ॥

जे केवळ प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका. (७)

जन्मला जयांचे उदरीं । तयासि जो विरोध करी ।
सखी मनिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८ ॥

ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्मलो, त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्ख समजावा. (८)

सांडून सर्वही गोत । स्त्री‍आधेन जीवित ।
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९ ॥

सर्व नातेवाइकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो, तो एक मूर्खच. (९)

परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्वशुरगृही वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १० ॥

जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासुरवाडीस जाऊन राहातो किंवा कुळशीलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो, तो एक मूर्खच. (१०)

समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता ।
सामर्थ्येंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११ ॥

जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो, मनात स्वतःला त्यांच्या बरोबरीचे मानतो, अंगी सामर्थ्य नसतां लोकांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो, तोही एक मूर्खच. (११)

आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२ ॥

जो स्वतःच आपली स्तुती करतो, आपल्या देशांत असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो, तोही मूर्खच जाणावा. (१२)

अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी ।
जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३ ॥

कारण नसताना जो उगीचच हसतो, विवेक शिकवू गेले असतां जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो, तो एक मूर्खच. (१३)

आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री ।
परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४ ॥

स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, उठत बसता जो दुसऱ्याची निंदा करतो, तोही मूर्खच होय. (१४)

बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन ।
परस्थळीं बहु भोजन- । करी, तो येक मूर्ख ॥ १५ ॥

अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकट्टाच खुशाल झोपतो, किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो, तो एक मूर्खच. (१५)

मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न ।
सप्त वेसनीं जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६ ॥

आपला मान अथवा अपमान स्वतःच जो उघड करून सांगतो, किंवा ज्याचे मन सात प्रकारच्या व्यसनांत रमते, तो एक मूर्खच समजावा. (सात व्यसने म्हणजे द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारारमण, लघुपक्षीक्रीडा व नायकिणीचे गायन.) (१६)

धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकास ।
निसुगाईचा संतोष- । मानी, तो येक मूर्ख ॥ १७ ॥

जो दुसर्‍याचा भरवसा धरून स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडतो व आळसातच संतोष मानतो, तो एक मूर्ख. (१७)

घरीं विवेक उमजे । आणि सभेमध्यें लाजे ।
शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८ ॥

घरी ज्ञान सांगतो आणि सभेत बोलताना लाजतो, शब्द बोलताना घाबरतो, तो एक मूर्खच. (१८)

आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट ।
सिकवेणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९ ॥

आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याशी फाजील सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकवू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो, तोही मूर्खच होय. (१९)

नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसी जाणीव दावी ।
जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २० ॥

जो आपले ऐकत नाही त्यास जो शिकवतो, मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो, वडिलांना कमीपणा आणतो, तो एक मूर्ख. (२०)

येकायेकीं येकसरा । जाला विषईं निलाजिरा ।
मर्यादा सांडून सैरा- । वर्ते, तो येक मूर्ख ॥ २१ ॥

जो अचानक कामवासनेपायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो, तोही मूर्खच. (२१)

औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा ।
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ ।

जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थांत संतोष मानीत नाही, तो एक मूर्खच होय. (२२)

संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी ।
उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३ ॥

सोबतीशिवाय जो विदेशात जातो, अनोळखी माणसाची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो, तो मूर्ख समजावा. (२३)

आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन ।
रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४ ॥

जो जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो, आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही, तो एक मूर्खच. (२४)

सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित ।
सर्वकाळ दुश्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५ ॥

आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहातो; अथवा ज्याचे चित्त सर्वकाळ अस्थिर असते, तोही मूर्खच जाणावा. (२५)

विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण ।
स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६ ॥

कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसताही विनाकारण दंड करतो, किंवा जो थोडक्यासाठी कंजूष बनतो, तो मूर्ख जाणावा. (२६)

देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ।
ज्याचे मुखीं भंडउशभंड । तो येक मूर्ख ॥ २७ ॥

जो देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही. स्वतः अशक्त असून शिवीगाळ करतो, कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो, तो मूर्खच जाणावा. (२७)

घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा ।
ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८ ॥

घरच्या लोकांशी रागाने वागतो, त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो असा जो कोणी वेडा, अज्ञानी असेल तो मूर्खच समजावा. (२८)

नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत ।
मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९ ॥

जो नीच जातींच्या लोकांत राहतो, परस्त्रीशी एकांत करतो, वाटेने जाताना खात खात जातो, तो एक मूर्खच. (२९)

स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार ।
करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३० ॥

स्वतः तर परोपकार करीतच नाही, कुणी उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करतो. करतो थोडे पण बोलतो फार, असा माणूस मूर्खच होय. (३०)

तपीळ खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं ।
धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१ ॥

जो तापट खादाड आळशी आहे, दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटिल आहे व ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही, तो मूर्खच होय. (३१)

विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान ।
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२ ॥

स्वतःजवळ विद्या, वैभव, धन किंवा कुठलाही पुरुषार्थ, सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाच अभिमान बाळगतो, तो एक मूर्खच. (३२)

लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड ।
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३ ॥

उर्मट खोटा, लबाड वाईट कृत्ये करणारा, कुटिल, नामर्द व जो फार झोपतो, तो एक मूर्खच होय. (३३)

उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे ।
सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४ ॥

उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो. शौचादी क्रिया जो चव्हाट्यावर करतो व सर्वकाळ जवळ जवळ वस्त्रहीन असतो, तोही मूर्खच जाणावा. (३४)

दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण ।
सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५ ॥

ज्याचे दात, डोळे, नाक, हात, पाय, कपडे इत्यादी सर्वकाळ अत्यंत मलिन असतात, तोही मूर्खच. (३५)

वैधृति आणी वितिपात । नाना कुमुहूर्तें जात ।
अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६ ॥

जो गावाला जाताना वैधृती, व्यतिपात इत्यादी विविध कुमुहूर्तांवर प्रयाण करतो, एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्यांचाही घात करतो, तो मूर्ख जाणावा. (३६)

क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी ।
जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७ ॥

जो कुणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो, तसेच ज्यास दृढ बुद्धी नाही, तो मूर्खच जाणावा. (३७)

जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी ।
नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८ ॥

आपल्या जिवलग माणसांना जो दुःख देतो, कधी सुखाचा शब्दही ऐकवत नाही आणि नीच माणसांना मात्र वंदन करतो, तो एक मूर्खच. (३८)

आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी ।
लक्ष्मीचा भरवसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९ ॥

स्वतःस नानापरीने जपतो, पण शरण आलेल्यांचे रक्षण करीत नाही व संपत्तीचा भरवसा धरतो, तो मूर्खच जाणावा. (३९)

पुत्र कळत्र आणी दारा । इतुकाचि मानुनियां थारा ।
विसरोन गेला ईश्वरा । तो येक मूर्ख ॥ ४० ॥

आपला मुलगा, कुटुंब, पत्नी हाच आपला आधार आहे, असे समजून जो देवाला विसरून जातो, तोही मूर्खच होय. (४०)

जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावाअवें ।
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१ ॥

जसे करावे तसे फळ मिळते, हे ज्याला कळत नाही, तोही मूर्खच समजावा. (४१)

पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्वरी देणें ।
ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२ ॥

पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी आठपट अधिक कामवासना असते. अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो, तो मूर्खच जाणावा. (४२)

दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले ।
दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३ ॥

दुर्जनाच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व दिवसाही डोळे झाकून घेतो, ज्ञान असून मुद्दाम अज्ञान्यासारखा वागतो, तोही मूर्खच. (४३)

देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही ।
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४ ॥

जो देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही असतो, तो मूर्खच जाणावा. (४४)

परपीडेचें मानी सुख । पससंतोषाचें मानी दुःख ।
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५ ॥

लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते व लोकांना आनंद झाला असता जो दुःखी होतो व हरवलेल्या वस्तूसाठी जो शोक करतो, तो मूर्खच होय. (४५)

आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६ ॥

कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही, कुणी न विचारताच साक्ष देतो व निंद्य वस्तूचा स्वीकार करतो तो मूर्खच जाणावा. (४६)

तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले ।
कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७ ॥

महत्त्व सोडून जो वायफळ बडबडतो, उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो व नीच कर्मे करणारांशी जो मैत्री करतो, तो मूर्खच होय. (४७)

पत्य राखों नेणें कदा । विनोद करी सर्वदा ।
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८ ॥

जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही, सदासर्वदा चेष्टामस्करी करतो, त्याला कुणी हसले तर मात्र चिडतो आणि भांडायला लागतो, तोही मूर्खच होय. (४८)

होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड ।
बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९ ॥

जो अवघड पैज मारतो, किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही, तो मूर्ख जाणावा. (४९)

वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे ।
जो गोत्रजांस विश्वासे । तो येक मूर्ख ॥ ५० ॥

स्वतःजवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो तो व जो भाऊबंदांवर विश्वास ठेवतो, ते दोघेही मूर्खच ! (५०)

तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे ।
आपलें आन्हीत करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१ ॥

जो चोराला आपली माहिती देतो, जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागारागाने आपलेच अनहित करतो, तो मूर्खच असतो. (५१)

हीन जनासीं बरोबरी । बोल बोले सरोत्तरीं ।
वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२ ॥

हीन लोकांशी जो बरोबरी करतो, उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो, तो मूर्ख जाणावा. (५२)

समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी ।
घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३ ॥

श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा, अलभ्य वस्तूचा हेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय. (५३)

सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा ।
सार्थकेंविण वेंची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४ ॥

ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरवसा धरतो आणि मनुष्यजीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवितो, तो एक मूर्खच होय. (५४)

संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें ।
मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५ ॥

संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्रांचे दोष जो लोकांत उघड करून सांगतो, तो एक मूर्खच. (५५)

अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी ।
जो विस्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६ ॥

कुणी लहानसहान अपराध केला तरी जो क्षमा करीत नाही व त्या व्यक्तीस सारखे धारेवर धरतो, तसेच जो विश्वासघात करतो, तो एक मूर्खच जाणावा. (५६)

समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे ।
क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७ ॥

जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो, सभा ज्याला विटते, कंटाळते, जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो, तो मूर्खच असतो. (५७)

बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक ।
ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८ ॥

कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कुणी योग्य नेता नसतो, तो मूर्खच जाणावा. (५८)

अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी ।
संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९ ॥

जो अनीतीने द्रव्य मिळवितो, धर्म, नीती, न्याय यांची पर्वा करत नाही, आपल्या सहकाऱ्यांना दुखावतो, तो एक मूर्खच होय. (५९)

घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी ।
बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी । तो येक मूर्ख ॥ ६० ॥

घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो, अनेक लोकांचे उष्टे जो स्वीकारतो तोही मूर्खच. (६०)

आपुलें अर्थ दुसयापासीं । आणी दुसयाचें अभिळासी ।
पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१ ॥

आपले द्रव्य दुसऱ्यापाशी ठेवतो व दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो, हलक्या लोकांच्या बरोबर देण्याघेण्याचा व्यवहार करतो, तो मूर्ख जाणावा. (६१)

अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे ।
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२ ॥

जो अतिथीला त्रास देतो, कुग्रामात राहातो व सदा सर्वदा चिंता करीत असतो, तो मूर्ख समजावा. (६२)

दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें ।
डो‍ई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३ ॥

दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असता हा तिसरा विनाकारणच तेथे जाऊन बसतो व दोन्ही हातांनी डोके खाजवितो, त्यास मूर्खच म्हणावे लागेल. (६३)

उदकामधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी ।
सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४ ॥

स्वच्छ पाण्यात चूळ टाकतो, पायाने पाय खाजवतो, हीनकुळाची सेवा करतो, तो एक मूर्खच. (६४)

स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें ।
मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५ ॥

स्त्रिया व मुले यांच्यात उगीचच मिसळतो, पिशाच्चाजवळ जाऊन बसतो, कुत्रे पाळतो, पण त्यास शिस्त लावत नाही, तो एक मूर्खच. (६५)

परस्त्रीसीं कळह करी । मुकी वस्तु निघातें मारी ।
मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६ ॥

जो परस्त्रीशी भांडतो, मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो, मूर्ख माणसाची संगत करतो, तो मूर्ख जाणावा. (६६)

कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे ।
खरें अस्ता खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७ ॥

जो भांडणतंटा पाहात उभा असतो, तो सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. उलट कौतुकाने बघतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो एक मूर्खच होय. (६७)

लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी ।
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८ ॥

संपत्ती प्राप्त झाली असता जो जुनी ओळख ठेवत नाही व देवाब्राह्मणांवर सत्ता गाजवतो, तो मूर्ख जाणावा. (६८)

आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी ।
पुढीलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९ ॥

जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत, जो इतरांशी नम्रतेने वागतो. मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही, तोही मूर्खच. (६९)

अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७० ॥

जो वाचताना अक्षरे गाळतो किंवा पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही, तो मूर्खच होय. (७०

आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी ।
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१ ॥

जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही, बासनात बांधून ठेवून देतो, तोही मूर्खच जाणावा. (७१)

ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे ।
चीत्त दे‍उनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥

अशी ही मूर्खलक्षणे अपार आहेत. यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बाणते. म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने यांचे श्रवण करतात. (७२)

लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती ।
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ७३ ॥

मूर्खांची लक्षणे अपार आहेत. पण त्यातील काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती वर्णन केली आहेत. तरी श्रोत्यांनी क्षमा करावी. (७३)

उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं ।
पुढिले समासी आघवीं । निरोपिलीं ॥ ७४ ॥

मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत, यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन केले आहे. (७४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥ १ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसवादे ‘मूर्खलक्षणनाम’ समास पहिला समाप्त.

समास दुसरा : उत्तमलक्षण

॥ श्रीराम ॥

श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥

आता मी उत्तम गुणांची लक्षणे वर्णन करून सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत. ही लक्षणे जर ग्रहण केली, तर अंगी सर्वज्ञता बाणते. (१)

वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घे‍ऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥

कुठेही जाताना योग्य प्रकारे मार्गाची चौकशी केल्याशिवाय जाऊ नये. फळ खाण्यापूर्वी त्यासंबंधी व्यवस्थित माहिती घेऊन मग ते खावे. वाटेत एखादी वस्तू पडलेली दिसली, तर ती एकाएकी उचलून घेऊ नये. (२)

अति वाद करूं नये । पोटीं कपट धरूं नये ।
शोधल्याविण करूं नये । कुळहीन कांता ॥ ३ ॥

फार वादविवाद करू नये. कुणाशीही कपटाने वागू नये, कुलशीलाची चौकशी केल्याखेरीज कुणाही मुलीशी विवाह करू नये. (३)

विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।
मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥ ४ ॥

विचार केल्याखेरीज बोलू नये. पूर्वचर्चेशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू नये. लोकात वागताना मर्यादेचे पालन जरूर करावे. (४)

प्रीतीविण रुसों नये । चोरास वोळखी पुसों नये ।
रात्री पंथ क्रमूं नये । येकायेकीं ॥ ५ ॥

प्रेम नसेल तर तेथे रुसू नये. चोरास परिचय विचारू नये. रात्री एकट्याने प्रवास करू नये. (५)

जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥

लोकांत सरळपणा कधी सोडू नये, पापमार्गाने द्रव्य मिळवू नये. कुठल्याही बिकट प्रसंगीही सन्मार्ग सोडू नये. (६)

निंदा द्वेष करूं नये । असत्संग धरूं नये ।
द्रव्यदारा हरूं नये । बळात्कारें ॥ ७ ॥

कुणाचीही निंदा करू नये, कुणाचा द्वेष करू नये, वाईट संगत धरू नये आणि बळजबरीने लोकांचे द्रव्य अथवा स्त्री यांचे अपहरण करू नये. (७)

वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये ।
विद्याअभ्यास सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ८ ॥

वक्ता बोलत असता मध्येच त्याचे खंडण करू नये. लोकांची एकी असेल तर त्यात भांडण लावून देऊन फूट पाडू नये. विद्याभ्यास करणे कधीही सोडू नये. (८)

तोंडाळासि भांडों नये । वाचाळासी तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥

तोंडाळ माणसाशी भांडायला जाऊ नये. वाचाळाशी वाद घालू नये आणि अंतर्यामी संतांची संगती कधीही सोडू नये. (९)

अति क्रोध करूं नये । जिवलगांस खेदूं नये ।
मनीं वीट मानूं नये । सिकवणेचा ॥ १० ॥

अति क्रोध करू नये. आपल्या प्रिय व्यक्तीला कधी दुखवू नये. कुणी आपल्या चांगल्यासाठी आपणास चार गोष्टी शिकवत असेल, तर त्याचा कंटाळा मानू नये. (१०)

क्षणाक्षणां रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये ।
केल्याविण सांगों नये । आपला पराक्रमु ॥ ११ ॥

वरचेवर रुसू नये. उगीच खोट्या फुशारक्या मारू नयेत. पराक्रम न करताच उगीच बढाया मारू नयेत. (११)

बोलिला बोल विसरों नये । प्रसंगी सामर्थ्य चुकों नये ।
केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसि कदा ॥ १२ ॥

आपण कुणाला शब्द दिला तर तो कधी विसरू नये. योग्य वेळी बळाचा उपयोग केल्याखेरीज राहू नये. आपण करून दाखविल्याखेरीज दुसऱ्याचा कधी तिरस्कार करू नये. (१२)

आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिलुआविण करूं नये । कार्य कांहीं ॥ १३ ॥

आळसात कधीही सुख मानू नये. कुणाची चहाडी करण्याचे कधी मनातही आणू नये. सर्व प्रकारे उलटसुलट विचार करूनच कोणतेही कार्य करावे. (१३)

सुखा आंग दे‍ऊं नये । प्रेत्न पुरुषें सांडूं नये ।
कष्ट करितां त्रासों नये । निरंतर ॥ १४ ॥

देहाचे फार चोचले करू नयेत. पुरुषाने प्रयत्न करणे कधीही सोडू नये. निरंतर कष्ट करावे लागले तरी त्रासू नये. (१४)

सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । काहीं केल्या ॥ १५ ॥

सभेमध्ये लाजू नये किंवा बाष्कळपणे वटवट करू नये, कुठल्याही परिस्थितीत पैजा मारू नये. (१५)

बहुत चिंता करूं नये । निसुगपणें राहों नये ।
परस्त्रीतें पाहों नये । पापबुद्धी ॥ १६ ॥

फार चिंता करू नये. निष्काळजीपणे राहू नये. परस्त्रीकडे कधीही पापबुद्धीने पाहू नये. (१६)

कोणाचा उपकार घे‍ऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विस्वासघात ॥ १७ ॥

शक्यतो कुणाकडून उपकार घेऊ नये. काही कारणाने घ्यावा लागला तर तो फेडल्याशिवाय राहू नये. परपीडा अथवा विश्वासघात कधीही करू नये. (१७)

शोच्येंविण असों नये । मळिण वस्त्र नेसों नये ।
जणारास पुसों नये । कोठें जातोस म्हणौनी ॥ १८ ॥

कधी अस्वच्छ, अशुद्ध राहू नये. मलिन वस्त्रे नेसू नयेत किंवा कुणी बाहेर जाण्यास निघाला असेल, तर ‘कोठे जातोस’ असेही कधी विचारू नये. (१८)

व्यापकपण सांडूं नये । पराधेन हो‍ऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ॥ १९ ॥

आपल्या अंतःकरणाची विशालता, औदार्य कधी सोडू नये. दुसऱ्याच्या आधीन होऊन राहू नये व आपला भारही दुसऱ्या कुणावर कधी घालू नये. (१९)

पत्रेंविण पर्वत करूं नये । हीनाचें रुण घे‍ऊं नये ।
गोहीविण जाऊं नये । राजद्वारा ॥ २० ॥

लेखी कागदपत्राशिवाय कधी देण्याघेण्याचा व्यवहार करू नये. नीच माणसांकडून कधी कर्ज घेऊ नये. साक्षीपुराव्याशिवाय राजदरबारी- कोर्टकचेरीत कधी जाऊ नये (२०)

लटिकी जाजू घे‍ऊं नये । सभेस लटिकें करूं नये ।
आदर नस्तां बोलों नये । स्वभाविक ॥ २१ ॥

कुणावरही खोटा आरोप करू नये. सभेस खोटे ठरवू नये. जेथे आपल्याविषयी आदर नसेल तेथे स्वाभाविकपणे बोलायला जाऊ नये. (२१)

आदखणेपण करूं नये । अन्यायेंविण गांजूं नये ।
अवनीतीनें वर्तों नये । आंगबळें ॥ २२ ॥

कुणाचाही मत्सर करू नये, उगीच अन्यायाने कुणालाही छळू नये. शरीरबळाच्या जोरावर कधीही अन्यायाने वागू नये. (२२)

बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करूं नये ।
बहुत दिवस राहूं नये । पिसुणाचेथें ॥ २३ ॥

अती आहार घेऊ नये. फार झोपही काढू नये. दुष्ट माणसाच्या घरी कधी फार दिवस राहू नये. (२३)

आपल्याची गोही दे‍ऊं नये । आपली कीर्ती वर्णूं नये ।
आपलें आपण हांसों नये । गोष्टी सांगोनी ॥ २४ ॥

केवळ आपला माणूस असे समजून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये. आपली कीर्ती आपणच वर्णन करून सांगू नये. गोष्टी सांगताना आपणच हसू नये. (२४)

धूम्रपान घे‍ऊं नये । उन्मत्त द्रव्य सेवूं नये ।
बहुचकासीं करूं नये । मैत्री कदा ॥ २५ ॥

धूम्रपान करू नये. मादक पदार्थाचे सेवन करू नये. वाचाळाशी मैत्री करू नये. (२५)

कामेंविण राहों नये । नीच उत्तर साहों नये ।
आसुदें अन्न से‍ऊं नये । वडिलांचेंहि ॥ २६ ॥

कामाशिवाय कधी मोकळे बसू नये. नीच उत्तर सहन करू नये. वडिलांचे असले तरी आयते अन्न कधी खाऊ नये. (२६)

तोंडीं सीवी असों नये । दुसयास देखोन हांसों नये ।
उणें अंगीं संचारों नये । कुळवंताचे ॥ २७ ॥

तोंडात शिवी नसावी. दुसऱ्याला पाहून त्याचा उपहास करून हसू नये. चांगल्या कुळातील माणसांचे अंगी उगीच कमीपणा चिकटवू नये. (२७)

देखिली वस्तु चोरूं नये । बहुत कृपण हो‍ऊं नये ।
जिवलगांसी करूं नये । कळह कदा ॥ २८ ॥

जी वस्तू दिसेल ती चोरू नये, अत्यंत कृपण होऊ नये. आपल्या जिवलगांशी कधी भांडण करू नये. (२८)

येकाचा घात करूं नये । लटिकी गोही दे‍ऊं नये ।
अप्रमाण वर्तों नये । कदाकाळीं ॥ २९ ॥

कोणाचाही घात करू नये. खोटी साक्ष देऊ नये. अमर्याद वर्तन कधीही करू नये. (२९)

चाहाडी चोरी धरूं नये । परद्वार करूं नये ।
मागें उणें बोलों नये । कोणीयेकाचें ॥ ३० ॥

कुणाची चहाडी करू नये, कुठलीही चोरी करू नये. परस्त्रीशी संबंध ठेवू नये व कुणाचेही पाठीमागे त्याची निंदा करू नये. (३०)

समईं यावा चुकों नये । सत्वगुण सांडूं नये ।
वैरियांस दंडूं नये । शरण आलियां ॥ ३१ ॥

प्रसंगी धैर्य दाखविण्यास चुकू नये. सत्त्वगुण कधी सोडू नये. शत्रू जर शरण आला तर त्यास कधी दंड देऊ नये. (३१)

अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये ।
मर्यादेविण चालों नये । पवित्र जनीं ॥ ३२ ॥

थोड्याशा ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नये. हरिभक्ती करण्यास कधी लाजू नये. पवित्र लोकांत वाटेल तसे अमर्याद वागू नये. (३२)

मूर्खासीं संमंध पडों नये । अंधारीं हात घालूं नये ।
दुश्चितपणें विसरों नये । वस्तु आपुली ॥ ३३ ॥

मूर्खाशी मैत्री करण्यास जाऊ नये. अंधारात कधी हात घालू नये. वेंधळेपणाने आपली वस्तू कुठेही विसरू नये. (३३)

स्नानसंध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये ।
अनाचार मांडूं नये । चुकुरपणें ॥ ३४ ॥

स्नानसंध्या (नित्यकर्म) सोडू नये. कुळाचारात खंड पडू देऊ नये. कष्टास घाबरून आळसाने अनाचार करू नये. (३४)

हरिकथा सांडूं नये । निरूपण तोडूं नये ।
परमार्थास मोडूं नये । प्रपंचबळें ॥ ३५ ॥

हरिकथेचे श्रवण, कीर्तन सोडू नये. अध्यात्मनिरूपण टाळू नये. प्रपंचांत दंग होऊन परमार्थाचा त्याग करू नये. (३५)

देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये ।
भलते भरीं भरों नये । विचारेंविण ॥ ३६ ॥

देवाचा नवस फेडण्यास चुकू नये. आपल्या धर्माचा त्याग करू नये. विचार न करता भिडेस बळी पडून भलतेसलते करू नये. (३६)

निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये ।
पा‍उस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥

निष्ठुरपणा करू नये, कुणाही जीवाची हत्या करू नये. फार पाऊस पडत असता किंवा अयोग्य वेळी कुठे जाऊ नये. (३७)

सभा देखोन गळों नये । समईं उत्तर टळों नये ।
धिःकारितां चळों नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥

सभा पाहून गडबडून जाऊ नये. वेळप्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये. कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चळू देऊ नये. (३८)

गुरुविरहित असों नये । नीच यातीचा गुरु करूं नये ।
जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥

गुरूवाचून राहू नये पण हलक्या जातीचा गुरू करू नये. वैभवाच्या योगे आयुष्य ही शाश्वत टिकणारी वस्तू आहे असे समजू नये. (३९)

सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घे‍ऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥

सत्यमार्ग कधीही सोडू नये. खोट्या मार्गाने कधी जाऊ नये व खोट्याचा अभिमानही बाळगू नये. (४०)

अपकीर्ति ते सांडावी । सद्की्र्ति वाढवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥

अपकीर्ती कधीही होऊ देऊ नये. सत्कीर्ती वाढवावी. विचारपूर्वक नेहमी सत्याचीच वाट दृढ धरावी. (४१)

नेघतां हे उत्तम गुण । तें मनुष्य अवलक्षण ।
ऐक तयांचे लक्षण । पुढिले समासीं ॥ ४२ ॥

हे उत्तम गुण जो घेत नाही, तो मनुष्य अवलक्षणी समजावा. पुढील समासात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन ऐका. (४२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उत्तामलक्षणनाम समास दुसरा ॥ २ ॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘उत्तमलक्षणनाम’ समास दुसरा समाप्त.

समास तिसरा : कुविद्यालक्षण

॥ श्रीराम ॥

ऐका कुविद्येचीं लक्षणें । अति हीनें कुलक्षणें ।
त्यागार्थ बोलिलीं ते श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥

आता कुविद्येची अति हीन अशी कुलक्षणे, त्यांचा त्याग करावा म्हणून वर्णन करून सांगतो, ती ऐकावी. (१)

ऐका कुविद्येचा प्राणी । जन्मा ये‍ऊन केली हानी ।
सांगिजेल येहीं लक्षणीं । वोळखावा ॥ २ ॥

आता कुविद्येचा प्राणी कसा ओळखावा ते त्याची जी लक्षणे वर्णन करतो त्यावरून कळेल त्याने जन्मास येऊन स्वतः चे अत्यंत नुकसान करून घेतलेले असते. (२)

कुविद्येचा प्राणी असे । तो कठिण निरूपणें त्रासे ।
अवगुणाची समृद्धि असे । म्हणौनियां ॥ ३ ॥

कुविद्येचा जो मनुष्य असतो, त्याच्या ठिकाणी अवगुणाची खाण असल्याने अवघड निरूपणाने तो त्रासून जातो. (३)

श्लोक ॥ दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम ॥

अर्थ : अर्जुना, आतां आसुरी संपत्तीचे गुण तुला सांगतो. आसुरी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषामध्ये पुढील गुण दिसतात. ‘ मी मोठा धार्मिक आहे ’ असे बाह्य वेष व आचार यांवरून लोकांस भासविणे, हा दंभ; पुष्कळ धन असणे, किंवा पिता, बंधु इत्यादि आप्त मोठा अधिकारी – राजाप्रभृति असणे, यामुळे सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जो मद उत्पन्न होतो, तो दर्प होय; अशा दर्पाने युक्त असलेला पुरुष मोठमोठ्या विद्वान् व शीलसंपन्न पुरुषांचाहि धिक्कार करतो. त्याचप्रमाणे ‘ मी उत्कृष्ट आहे ’ असे मानणे, कोप, कठोर – मर्मभेदक शब्द बोलणे, जसे कुरूपाला सुस्वरूप, हीनाला उत्तम, आंधळ्याला डोळस, इत्यादि म्हणणे व कर्तव्याकर्तव्याविषयीचे अविवेकज्ञानमिथ्याप्रत्यय; हे पांच गुण राजस पुरुषांमध्ये मुख्यतः असतात.

काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार ।
गर्व ताठा अहंकार । द्वेष विषाद विकल्पी ॥ ४ ॥
आशा ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना ।
असूय अविज्ञा ईषणा वासना । अतृप्ती लोलंगता ॥ ५ ॥
इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा । आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।
जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ती दुर्वासना ॥ ६ ॥
स्पर्धा खटपट आणि चटचट । तर्हे झटपट आणी वटवट ।
सदा खटपट आणी लटपट । परम वेथा कुविद्या ॥ ७ ॥

अर्थ – दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही आसुरी संपत्तीची लक्षणे आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, (लोकेषणा, वित्तेषणा, दारेषणा किंवा कुणी म्हणतात पुत्रेषणा या) तीन ईषणा, वासना, अतृप्ती, आसक्ती, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनीती, गावगुंडपणा करणे, सदा मस्तीत राहणे, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट आणि लटपट तर्‍हेवाईकपणा, झटपट काम उरकण्याची घाई, वटवट करणे, सदा तक्रार करण्याचा स्वभाव, कसे तरी काम उरकणे, ही सर्व कुविद्येची लक्षणे असून कुविद्या हा एक भयंकर रोगच आहे. (४-७)

कुरूप आणी कुलक्षण । अशक्त आणी दुर्जन ।
दरिद्री आणी कृपण । आतिशयेंसीं ॥ ८ ॥

कुविद्येचा माणूस कुरूप आणि कुलक्षणी, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री असून अतिशय कंजूष असतो. (८)

आळसी आणी खादाड । दुर्बळ आणी लाताड ।
तुटक आणी लाबाड । आतिशयेंसीं ॥ ९ ॥

तो आळशी आणि खादाड असतो व दुर्बळ असूनही उर्मट व अत्यंत लबाड आणि फटकून वागणारा असतो. (९)

मूर्ख आणी तपीळ । वेडें आणी वाचाळ ।
लटिकें आणी तोंडाळ । आतिशयेंसीं ॥ १० ॥

तो मूर्ख असून तापट वेडा असून वाचाळ खोल असूनही अतिशय तोंडाळ असतो. (१०)

नेणे आणी नायके । न ये आणी न सीके ।
न करी आणी न देखे । अभ्यास दृष्टी ॥ ११ ॥

स्वतःला काही कळत नाही, तरी दुसऱ्याचे ऐकत नाही. स्वतःस काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर शिकतही नाही. स्वतः काही करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहातही नाही. (११)

अज्ञान आणी अविस्वासी । छळवादी आणी दोषी ।
अभक्त आणी भक्तांसी । देखों सकेना ॥ १२ ॥

अज्ञानी असून अविश्वासी, लोकांना छळणारा, दोषी, अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. (१२)

पापी आणी निंदक । कष्टी आणी घातक ।
दुःखी आणी हिंसक । आतिशयेंसीं ॥ १३ ॥
हीन आणी कृत्रिमी । रोगी आणी कुकर्मी ।
आचंगुल आणी अधर्मी । वासना रमे ॥ १४ ॥

पापी, निंदा करणारा, स्वत: दुःखी-कष्टी असून लोकांचा घात करणारा आणि हिंसक, अतिशय क्रूर असा असतो. हीन बुद्धीचा असून दुसऱ्याची नक्कल करणारा, रोगी असून कुकर्म करणात, कृपण असूनही अधर्मात जो रमतो असा असतो. (१३-१४)

हीन देह आणी ताठा । अप्रमाण आणी फांटा ।
बाष्कळ आणी करंटा । विवेक सांगे ॥ १५ ॥

देह हीन असूनही त्याच्या अंगी गर्व असतो, स्वतः अप्रमाण म्हणजे अमर्यादशील असून फाटे फोडणारा असतो. अर्थहीन बडबड करणारा, अभागी असून दुसऱ्याला विवेकाच्या गोष्टी सांगत असतो. (१५)

लंडी आणी उन्मत्त । निकामी आणी डुल्लत ।
भ्याड आणी बोलत । पराक्रमु ॥ १६ ॥

तो भित्रा असून उन्मत्त असतो, कुचकामाचा असून ऐट मिरविणारा आणि भ्याड असून पराक्रमाच्या बढाया मारणारा असतो. (१६)

कनिष्ठ आणी गर्विष्ठ । नुपरतें आणी नष्ट ।
द्वेषी आणी भ्रष्ट । आतिशयेंसीं ॥ १७

तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ असतो, विषयासक्त असून नष्ट असतो व अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट असतो. (१७)

अभिमानी आणी निसंगळ । वोडगस्त आणी खळ ।
दंभिक आणी अनर्गळ । आतिशयेंसीं ॥ १८ ॥

अभिमानी असून निर्लज्ज, संकटात सापडलेला असूनही दुष्ट अत्यंत दांभिक आणि मिथ्या बोलणारा असतो. (१८)

वोखटे आणी विकारी । खोटे आणी अनोपकारी ।
अवलक्ष्ण आणी धिःकारी । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥

अती लंपट व विकारी, खोय्टा आणि अपकार करणारा, अवलक्षणी असूनही प्राणिमात्रांचा धिक्कार करणारा असतो. (१९)

अल्पमती आणी वादक । दीनरूप आणि भेदक ।
सूक्ष्म आणी त्रासक । कुशब्दें करूनि ॥ २० ॥

मंदबुद्धीचा असून वाद घालतो, दीनवाणा असूनही मर्मभेदक बोलतो, धूर्त कपटी असून वाईट शब्दाने लोकांना त्रास देणारा असतो. (२०)

कठिणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी ।
दुःखवचनी तीव्रवचनी । क्रूर निष्ठुर दुरात्मा ॥ २१ ॥

तो कठोर वचने बोलणारा, कर्कश आवाजात ओरडून बोलणारा, कपटी वचने बोलणारा व संशययुक्त बोलणारा, मर्मभेदक, लोकांना दुःख होईल असे टोचून बोलणारा, अत्यंत कूर निष्ठुर दुरात्माच असतो. (२१)

न्यूनवचनी पैशून्यवचनी । अशुभवचनी अनित्यवचनी ।
द्वेषवचनी अनृत्यवचनी । बाष्कळवचनी धिःकारु ॥ २२ ॥

तो दुसऱ्याचे न्यून उघड करणारा, लावालावी करणारा, चहाडखोर अशुभ शब्द बोलणारा, बोलणे फिरविणारा, द्वेषयुक्त, असत्य भाषण करणारा व बाष्कळपणे लोकांचा धिक्कार करणारा असतो. (२२)

कओअटी कुटीळ गाठ्याळ । कुर्टें कुचर नट्याळ ।
कोपी कुधन टवाळ । आतिशयेंसीं ॥ २३ ॥

तो कपटी, कुटिल, आंतल्या गाठीचा, मनांतल्या मनांत कुढणारा, कामचुकार, नष्ट तापट, वाईट मार्गाने द्रव्य मिळविणारा व अत्यंत टवाळखोर असतो. (२३)

तपीळ तामस अविचार । पापी अनर्थी अपस्मार ।
भूत समंधी संचार । आंगीं वसे ॥ २४ ॥

तो तापट तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्मारांनी पीडित व ज्याच्या अंगात भूत, समंधादी संचारतात असा असतो. (२४)

आत्महत्यारा स्त्रीहत्यारा । गोहत्यारा ब्रह्महत्यारा ।
मातृहत्यारा पितृहत्यारा । माहापापी पतित ॥ २५ ॥

तो आत्महत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, मातृहत्या, पितृहत्या करणारा अत्यंत पतित आणि महापातकी असतो. (२५)

उणें कुपात्र कुतर्की । मित्रद्रोही विस्वासघातकी ।
कृतघ्न तल्पकी नारकी । अतित्याई जल्पक ॥ २६ ॥

तो सर्वच बाबतीत उणा म्हणजे कमी दर्जाचा असून नालायक, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतघ्न, मात्रागमनी, नरकात जाण्यास योग्य, अघोरी व बडबड्या असतो. (२६)

किंत भांडण झगडा कळहो । अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो ।
चाहाड वेसनी विग्रहो । निग्रहकर्ता ॥ २७ ॥

संशय बाळगणारा, भांडण, झगडा, कलह करणारा, अधर्माने, रूढीविरुद्ध वागणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर व्यसनी, फूट पाडणारा व लोकांना धाकात ठेवणारा असतो. (२७)

द्वाड आपेसी वोंगळ । चाळक चुंबक लच्याळ ।
स्वार्थी अभिळासी वोढाळ । आद्दत्त झोड आदखणा ॥ २८ ॥

तो द्वाड, अपयशी, अस्वच्छ, चाळविणारा, कंजूष, लोचट, स्वार्थी, अभिलाषी, आसक्त, कवडीचुंबक, कोडगा, द्वेष करणारा असतो. (२८)

शठ शुंभ कातरु । लंड तर्मुंड सिंतरु ।
बंड पाषांड तश्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥

तो लबाड बेअकली, भ्याड, नाही तेथे डोके खुपसणारा, ठक, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्याच्या वस्तू पळविणारा असतो. (२९)

धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजट ।
थोट उद्धट लंपट । बटवाल कुबुद्धी ॥ ३० ॥

तो साहसी, स्वैराचारी, मोकाट वागणारा, बडबड्या, चावट वात्रट कुभांड रचणारा, उद्धट लंपट भ्रष्ट व कुबुद्धी असतो. (३०)

मारेकरी वरपेकरी । दरवडेकरी खाणोरी ।
मैंद भोंदु परद्वारी । भुररेकरी चेटकी ॥ ३१ ॥

तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर काळीजखाऊ, मैंद, भोंदू बाहेरख्याली, मोहिनीविद्येने भुलविणारा, चेटूक करणारा असतो. (३१)

निशंक निलाजिरा कळभंट । टौणपा लौंद धट उद्धट ।
ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ॥ ३२ ॥

तो निःशंक, निलाजरा, भांडकुदळ टोणपा, गलेलठ्ठ, धटिंगण व उद्धट असून नफ्फट अक्षरशत्रू शठ, नष्ट सार्‍या जगाशी भांडणारा व विकारी असतो. (३२)

अधीर आळिका अनाचारी । अंध पंगु खोकलेंकरी ।
थोंटा बधिर दमेकरी । तर्ह्ही ताठा न संडी ॥ ३३ ॥

तो उतावळ्या स्वभावाचा, हावरा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकलेकरी, थोय, बहिरा, दमेकरी असा रोगजर्जर असूनही ताठा न सोडणारा असतो. (३३)

विद्याहीन वैभवहीन । कुळहीन लक्ष्मीहीन ।
शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीन भिकारी ॥ ३४ ॥

तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारीच असतो. (३४)

बळहीन कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन ।
लक्षणहीन लावण्यहीन । आंगहीन विपारा ॥ ३५ ॥

तो बल्लीन, कळहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन कुरूप असा असतो. (३५)

युक्तिहीन बुद्धिहीन । आचारहीन विचारहीन ।
क्रियाहीन सत्वहीन । विवेकहीन संशई ॥ ३६ ॥

तो युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्त्वहीन, विवेकहीन, संशयी असतो. (३६)

भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।
शांतिहीन क्ष्माहीन । सर्वहीन क्षुल्लकु ॥ ३७ ॥

तो भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन सर्वच प्रकारे हीन, अगदी क्षुद्र, असा असतो. (३७)

समयो नेणे प्रसंग नेणे । प्रेत्न नेणे अभ्यास नेणे ।
आर्जव नेणे मैत्री नेणे । कांहींच नेणे अभागी ॥ ३८ ॥

त्यास वेळप्रसंग कळत नाही, प्रयत्न करणे जमत नाही, अभ्यास जमत नाही, आर्जवाने वागता येत नाही, कुणाशी मैत्री करता येत नाही, त्या अभाग्यास काहीच करणे जमत नाही. (३८)

असो ऐसे नाना विकार । कुलक्षणाचें कोठार ।
ऐसा कुविद्येचा नर । श्रोतीं वोळखावा ॥ ३९ ॥

असो, याप्रमाणे नाना विकार ज्याच्या ठिकाणी आहेत, जो कुलक्षणाचे जणू कोठारच आहे, तो कुविद्येचा नर आहे, असे श्रोत्यांनी ओळखावे. (३९)

ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि त्यागची करणें ।
अभिमानीं तर्ह्हें भरणें । हें विहित नव्हें ॥ ४० ॥

याप्रमाणे येथे कुविद्येची जी लक्षणे सांगितली आहेत, त्यांचा त्याग करावा हेच बरे ! अभिमानाने हट्टास पेटून ही वाईट लक्षणे न सोडण्याच्या भरीस पडणे योग्य नाही. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कुविद्यालक्षणनाम समास तिसरा ॥ ३ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कुविद्याक्षणनाम’ समास तिसरा समाप्त

समास चौथा : भक्तिनिरूपण

॥ श्रीराम ॥

नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ ।
त्याहिमधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥

अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ म्हणूनच केवळ नरदेहाची प्राप्ती होते. त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले तरच मनुष्य सन्मार्गास लागतो. (१)

नरदेहीं विशेष ब्राह्मण । त्याहीवरी संध्यास्नान ।
सद्वासना भगवद्भयजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥

नरदेहातही विशेषेकरून ब्राह्मण कुळात जन्म लाभणे, संध्यास्नान इत्यादी नित्यकर्मे व्यवस्थित करण्याची बुद्धी होणे व उत्तम वासना राहून हातून भगवद्‌भजन घडणे, हे सर्व पूर्वपुण्याईनेच होऊ शकते. (२)

भगवद्भनक्ति हे उत्तम । त्याहिवरी सत्समागम ।
काळ सार्थक हाचि परम । लाभ, जाणावा ॥ ३ ॥

भगवद्‌भक्ती करणे हे उत्तम आहेच. त्यांतही संतांचा सहवास लाभून काळ सार्थकी लागत असेल, तर हा फारच मोठा लाभ जाणावा. (३)

प्रेमप्रीतीचा सद्भा व । आणी भक्तांचा समुदाव ।
हरिकथा मोहोत्साव । तेणें प्रेमा दुणावे ॥ ४ ॥

हृदयांत भगवंताबद्दल विशुद्ध प्रेमभावना असेल व त्यात भगवद्‌भक्ताचा समुदाय जमून त्या महोत्सवात हरिकथाश्रवण घडले तर त्यायोगे भगवत्प्रेम दुणावते. (४)

नरदेहीं आलियां येक । कांही करावें सार्थक ।
जेणें पाविजे परलोक । परम दुल्लभ जो ॥ ५ ॥

नरदेह प्राप्त झाला असतां त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे परम दुर्लभ जो परलोक त्याची प्राप्ती होते. (५)

विधियुक्त ब्रह्मकर्म । अथवा दया दान धर्म ।
अथवा करणें सुगम । भजन भगवंताचें ॥ ६ ॥

त्यासाठी ब्रह्मकर्म विधियुक्त करावे अथवा दुसऱ्यावर दया करावी, दानधर्मादी करावे व सर्वांत सोपे साधन म्हणजे भगवंताचे भजन करावे. (६)

अनुतापें करावा त्याग । अथवा करणें भक्तियोग ।
नाहीं तरी धरणें संग । साधुजनाचा ॥ ७ ॥

पश्चात्तापाने संसाराचा त्याग करावा अथवा भक्तियोगाचे आचरण करावे. नाही तर निदान साधुपुरुषाच्या संगतीत राहावे. (७)

नाना शास्त्रें धांडोळावीं । अथवा तीर्थे तरी करावीं ।
अथवा पुरश्चरणें बरवीं । पापक्षयाकारणें ॥ ८ ॥

अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा कराव्या किंवा निदान पापक्षय व्हावा म्हणून उत्तम मंत्रांची पुरश्चरणे तरी करावीत. (८)

अथवा कीजे परोपकार । अथवा ज्ञानाचा विचार ।
निरूपणीं सारासार । विवेक करणें ॥ ९ ॥

अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानासंबंधी विचार करावा किंवा ऐकलेल्या निरूपणातून सारासार विवेक ग्रहण करावा. (९)

पाळावी वेदांची आज्ञा । कर्मकांड उपासना ।
जेणें हो‍इजे ज्ञाना- । आधिकारपात्र ॥ १० ॥

वेदांची आज्ञा पाळावी व ज्ञानाच्या अधिकारास पात्र होण्यासाठी कर्ममार्ग, उपासना यांचे व्यवस्थित आचरण करावे. (१०)

काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
कांहीं तरी येका भजनें । सार्थक करावें ॥ ११ ॥

काया, वाचा आणि मनाने, जी सामग्री प्राप्त होईल त्याने पाने, फुले फळे अथवा जल यांनी भगवंताचे पूजन, भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे. (११)

जन्मा आलियाचें फळ । कांहीं करावें सफळ ।
ऐसें न करितां निर्फळ । भूमिभार होये ॥ १२ ॥

नरजन्मास आल्यासारखे काही ना काही साधन करून तो जन्म सार्थकी लावावा. असे जर केले नाही, तर जन्म वाया जाऊन आपण केवळ पृथ्वीला भारभूत होऊन राहतो. (१२)

नरदेहाचे उचित । कांहीं करावें आत्महित ।
येथानुशक्त्या चित्तवित्त । सर्वोत्तमीं लावावें ॥ १३ ॥

नरदेहाचा यथोचित उपयोग करून आत्महित साधावे. आपापल्या कुवतीस अनुसरून आपले चित्त व वित्त त्या सर्वोत्तमाचे- भगवंताचे चरणी समर्पित करावे. (१३)

हें कांहींच न धरी जो मनीं । तो मृत्यप्राय वर्ते जनीं ।
जन्मा ये‍ऊन तेणें जननी । वायांच कष्टविली ॥ १४ ॥

यापैकी जो काहीच करीत नाही, तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखाच जाणावा. जन्मास येऊन त्याने आपल्या मातेला उगीचच कष्ट दिले असे म्हणावे लागते. (१४)

नाहीं संध्या नाहीं स्नान । नाहीं भजन देवतार्चन ।
नाहीं मंत्र जप ध्यान । मानसपूजा ॥ १५ ॥

अशी माणसे, स्नान, संध्या, भजन, देवतार्चन, मंत्रजप, ध्यान वा मानसपूजा काहीच करीत नाहीत. (१५)

नाहीं भक्ति नाहीं प्रेम । नाहीं निष्ठा नाहीं नेम ।
नाहीं देव नाहीं धर्म । अतीत अभ्यागत ॥ १६ ॥

ती भक्ती करीत नाहीत, भगवंतावर प्रेम करीत नाहीत, त्यांची कुठेही निष्ठा नसते. ती कुठलाही नेम पाळीत नाहीत, देव नाही, धर्म नाही, भोजनसमयी आलेल्या अतिथीचा सत्कार अन्नदान करीत नाहीत. (१६)

नाहीं सद्बुाद्धि नाहीं गुण । नाहीं कथा नाहीं श्रवण ।
नाहीं अध्यात्मनिरूपण । ऐकिलें कदां ॥ १७ ॥

त्यांच्या ठिकाणी सद्‌बुद्धी नसते, उत्तम गुण नसतात, ते कीर्तन, श्रवण, किंवा अध्यात्मनिरूपण यांपैकी काहीही करत नाहीत. (१७)

नाहीं भल्यांची संगती । नाहीं शुद्ध चित्तवृत्ती ।
नाहीं कैवल्याची प्राप्ती । मिथ्यामदें ॥ १८ ॥

ती सज्जनांची संगत करीत नाहीत, त्यांची चित्तशुद्धी होत नाही व मिथ्या मदामुळे त्यांना मोक्षाची प्राप्तीही नाही. (१८)

नाहीं नीति नाहीं न्याये । नाहीं पुण्याचा उपाये ।
नाहीं परत्रीची सोये । युक्तायुक्त क्रिया ॥ १९ ॥

ती न्यायाची चाड बाळगत नाहीत. पुण्यप्राप्तीसाठी प्रयत्‍न करीत नाहीत, युक्तायुक्त क्रियेसंबंधी विचारही करीत नाहीत व परलोकात उत्तम गती मिळावी, यासाठीही काही उपाय करीत नाहीत. (१९)

नाहीं विद्या नाहीं वैभव । नाहीं चातुर्याचा भाव ।
नाहीं कळा नाहीं लाघव । रम्यसरस्वतीचें ॥ २० ॥

विद्या, वैभव, चातुर्य, कला, किंवा सुंदर सरस्वतीचा वाग्विलास इत्यादी त्यांच्याजवळ काहीच नसते. (२०)

शांती नाहीं क्ष्मा नाहीं । दीक्षा नाहीं मैत्री नाहीं ।
शुभाशुभ कांहींच नाहीं । साधनादिक ॥ २१ ॥

शांती, क्षमा, दीक्षा म्हणजे एखादे व्रत, नेम पाळणे, सज्जनांशी मैत्री, इत्यादी शुभाशुभ साधनादिक त्यांच्यापाशी नसते. (२१)

सुचि नाहीं स्वधर्म नाहीं । आचार नाहीं विचार नाहीं ।
आरत्र नाहीं परत्र नाहीं । मुक्त क्रिया मनाची ॥ २२ ॥

पवित्रता, स्वधर्मविचार उत्तम आचार व विचार इहलोकीचे सार्थक करण्यासंबंधी किंवा परलोकातील गतिसंबंधी विचार ते करीत नाहीत. आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे ते अनिर्बंध रीतीने वागतात. (२२)

कर्म नाहीं उपासना नाहीं । ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं ।
योग नाहीं धारिष्ट नाहीं । कांहीच नाहीं पाहातां ॥ २३ ॥

त्यांच्या ठिकाणी कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धैर्य नाही; याप्रमाणे पाहू गेल्यास काहीच चांगले आढळून येत नाही. (२३)

उपरती नाहीं त्याग नाहीं । समता नाहीं लक्षण नाहीं ।
आदर नाहीं प्रीति नाहीं । परमेश्वराची ॥ २४ ॥

त्यांच्या ठिकाणी विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे, भगवंताविषयी आदर वा प्रीती या सर्वच गोष्टींचा अभाव असतो. (२४)

परगुणाचा संतोष नाहीं । परोपकारें सुख नाहीं ।
हरिभक्तीचा लेश नाहीं । अंतर्यामीं ॥ २५ ॥

लोकांचे गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही. परोपकाराचे सुख त्यांना माहीत नसते व अंतर्यामी हरिभक्तीचा लेशही नसतो. (२५)

ऐसे प्रकारीचे पाहातां जन । ते जीतचि प्रेतासमान ।
त्यांसीं न करावें भाषण । पवित्र जनीं ॥ २६ ॥

अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंत असून प्रेतासमान अपवित्र समजावेत व पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये. (२६)

पुण्यसामग्री पुरती । तयासीच घडें भगवद्भाक्ती ।
जें जें जैसें करिती । ते पावती तैसेंचि ॥ २७ ॥

जर पूर्वपुण्याचा संग्रह असेल, तर त्या पुण्यवान मनुष्याकडूनच भगवद्‌भक्ती घडते. ज्याचे पूर्व कर्म जसे असते, त्याप्रमाणेच त्यांना तसे फळ प्राप्त होत असते. (२७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भक्तिनिरूपणणनाम समास चवथा ॥ ४ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘ भक्तिनिरूपणनाम ‘ समास चौथा समाप्त.

समास पाचवा : रजोगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा ।
त्यामध्यें सत्त्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥

हा देह मुळात त्रिगुणांचा आहे. ते तीन गुण म्हणजे सत्त्व, रज व तमोगुण. त्यामध्ये उत्तम गुण म्हणजे सत्त्वगुण होय. (१)

सत्वगुणें भगवद्भवक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।
तमोगुणें अधोगती । पावति प्राणी ॥ २ ॥

सत्त्वगुणाने भगवद्‌भक्तीची प्राप्ती होते. रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते, तर तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते. (२)

श्लोक ॥ ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥

अर्थ- सत्त्वगुणप्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात. रजोगुणप्रधान माणसे मध्ये राहतात, तर तमोगुणप्रधान हीन वृत्तीची माणसे अधोगतीला जातात.

त्यांतहि शुद्ध आणी सबळ । तेहि बोलिजेति सकळ ।
शुद्ध तेंचि जें निर्मळ । सबळ बाधक जाणावें ॥ ३ ॥

गुणांमध्ये शुद्ध व शबल दोन प्रकारचा भेद आहे. शुद्ध ते निर्मळ असते तर शबल अशुद्ध असून बाधक असते. ते सर्व आता वर्णन करून सांगतो. (३)

शुद्धसबळाचें लक्षण । सावध परिसा विचक्षण ।
शुद्ध तो परमार्थी जाण । सबळ तो संसारिक ॥ ४ ॥

शुद्ध आणि शबल यांची वर्णने आता सांगतो ती सुज्ञांनी सावधपणे ऐकावी. शुद्ध गुण पारमार्थिक असतो तर शबल प्रापंचिक असतो. (४)

तयां संसारिकांची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती ।
येक येतां दोनी जाती । निघोनियां ॥ ५ ॥

त्या प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ते ऐका. त्याच्या देहात तिन्ही गुणांचे कार्य चालते. एकाचा जोर होतो, तेव्हा दुसरे दोन्ही क्षीण होतात. (५)

रज तम आणी सत्व । येणेंचि चाले जीवित्व ।
रजोगुणाचें कर्तृत्व । दाखऊं आता ॥ ६ ॥

रज, तम आणि सत्त्व या तीन गुणांच्या योगानेच जीवननिर्वाह होतो. त्यातील रजोगुणाचे कर्तृत्व येथे आता दाखवू या. (६)

रजोगुण येतां शरिरीं । वर्तणुक कैसी करी ।
सावध हो‍ऊनी चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥

शरीरात रजोगुण प्रबळ होतो, तेव्हा वर्तणूक कशी होते, ते चतुर लोकांनी सावध होऊन ऐकावे. (७)

माझें घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर ।
ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥

रजोगुण प्रबळ झाला की तो माणूस ”माझे घर माझा संसार येथे देव थोर म्हणून कुठला आणला ” असे निर्धारपूर्वक म्हणू लागतो. (८)

माता पिता आणी कांता । पुत्र सुना आणी दुहिता ।
इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगोण ॥ ९ ॥

तो आईवडील, बायको, मुले सुना, मुली इतक्यांचीच चिंता वाहतो. (९)

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
दुसर्याचें अभिळाषावें । तो रजोगोण ॥ १० ॥

रजोगुणी माणसाची वृत्ती बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे एवढेच नव्हे, तर दुसऱ्याच्या वस्तूंचीही अभिलाषा बाळगावी, अशा प्रकारची असते. (१०)

कैंचा धर्म कैंचें दान । कैंचा जप कैंचें ध्यान ।
विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥

कसला आला आहे धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान, असे म्हणून जो पापपुण्याचा विचार करीत नाही, तो रजोगुण होय. (११)

नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत ।
अनाचारीं मनोगत । तो रजोगोण ॥ १२ ॥

रजोगुण तीर्थ, व्रत, अतिथि-अभ्यागत तरजाणतच नाही उलट त्याची मनोवृत्ती अनाचाराकडे झुकणारी असते. (१२)

धनधान्याचे संचित । मन होये द्रव्यासक्त ।
अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगोण ॥ १३ ॥

ज्याच्या घरी धनधान्याचा भरपूर साठा असूनही ज्याचे मन द्रव्यासक्त असते व जो अत्यंत कंजूष असतो, तो रजोगुण होय. (१३)

मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर ।
मी सकळांमध्ये थोर- । म्हणे, तो रजोगुण ॥ १४ ॥

मी तरुण आहे, मी सुंदर आहे, मी बलाढ्य आहे, मी चतुर आहे. एवढेच नव्हे तर मीच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे म्हणतो, तो रजोगुण होय. (१४)

माझा देश माझा गांव । माझा वाडा माझा ठाव ।
ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगोण ॥ १५ ॥

हा माझा देश आहे, हा माझा गाव आहे, हा वाडा माझा आहे, हे माझे राहाण्याचे ठिकाण आहे, अशी मनात अत्यंत हाव जो बाळगतो, तो रजोगुण होय. (१५)

दुसर्या चें सर्व जावें । माझेचेंचि बरें असावें ।
ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगोण ॥ १६ ॥

दुसऱ्याचे सर्व जावे, पण माझे मात्र सर्व बरे असावे, असे स्वाभाविकपणे ज्याच्या मनास वाटते, तो रजोगुणच होय. (१६)

कपट आणी मत्सर । उठे देहीं तिरस्कार ।
अथवा कामाचा विकार । तो रजोगोण ॥ १७ ॥

जो कपटी आणि मत्सरी असून दुसऱ्याचा तिरस्कार करतो व ज्याच्या ठिकाणी कामविकार प्रबळ असतो, तो रजोगुण जाणावा. (१७)

बाळकावरी ममताअ । प्रीतीनें आवडे कांता ।
लोभ वाटे समस्तां । तो रजोगोण ॥ १८ ॥

ज्याची मुलांवर ममता असते, बायकोवर ज्याचे फार प्रेम असते व सर्वांविषयी ज्यास लोभ असतो, तो रजोगुण होय. (१८)

जिवलगांची खंती । जेणें काळें वाटे चित्तीं ।
तेणें काळें सीघ्रगती । रजोगुण आला ॥ १९ ॥

ज्या वेळी निकटच्या आप्तस्वकीयांविषयी अत्यंत काळजी वाटू लागते, त्या वेळी रजोगुण प्रबळ झाला आहे, असे समजावे. (१९)

संसाराचे बहुत कष्ट । कैसा हो‍ईल सेवट ।
मनास आठवे संकट । तो रजोगोण ॥ २० ॥

संसारात इतके कष्ट आहेत, आता शेवट कसा होतो कुणास ठाऊक, असे ज्याच्या मनास संकट वाटते, तो रजोगुणच होय. (२०)

कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें ।
दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगोण ॥ २१ ॥

किंवा पूर्वी जे जे काही भोगावे लागले, त्याची मनात आठवण येऊन ज्याला अत्यंत दुःख होते, तो रजोगुणच होय. (२१)

वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटीं ।
आशागुणें हिंपुटी- । करी, तो रजोगुण ॥ २२ ॥

दुसर्‍याचे वैभव दृष्टीस पडल्यावर ज्याला आपल्यालाही तसे प्राप्त व्हावे अशी आवड उत्पन्न होते आणि त्या आशेच्या योगाने जो कष्टी होतो, तो रजोगुण जाणावा. (२२)

जें जें दृष्टी पडिलें । तें तें मनें मागितलें ।
लभ्य नस्तां दुःख जालें । तो रजोगोण ॥ २३ ॥

जे जे दृष्टीस पडते, ते ते लगेच मनाला हवेसे वाटते, पण ते मिळण्यासारखे नसेल तर ज्यायोगे दुःख होते, तो रजोगुण जाणावा. (२३)

विनोदार्थीं भरे मन । शृंघारिक करी गायेन ।
राग रंग तान मान । तो रजोगोण ॥ २४ ॥

ज्याचे मन हास्यविनोदाच्या योगे प्रसन्न होते, जो शृंगारिक गाणी गातो, ज्याला राग, रंग, तान, मान यात रस असतो, तो रजोगुण. (२४)

टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे वेवादा ।
हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगोण ॥ २५ ॥

व्यंगोक्ती, थट्टामस्करी, निंदा करणे व वादविवाद करणे ज्याला आवडते, जो सर्वदा हास्यविनोद करीत असतो, तो रजोगुणच. (२५)

आळस उठे प्रबळ । कर्मणुकेचा नाना खेळ ।
कां उपभोगाचे गोंधळ । तो रजोगोण ॥ २६ ॥

ज्याच्या ठिकाणी अत्यंत आळस असतो, जो करमणुकीसाठी नाना प्रकारचे खेळ खेळतो व जेथे व्यसनांचा गोंधळ चालू असतो, तो रजोगुण जाणावा. (२६)

कळावंत बहुरूपी । नटावलोकी साक्षेपी ।
नाना खेळी दान अर्पी । तो रजोगोण ॥ २७ ॥

जो कलावंत असतो, बहुरूप्याप्रमाणे नाना सोंगे घेतो, नाटकाचा जो शौकीन असतो, नाना प्रकारच्या खेळांवर जो पैसे घालवतो, तो रजोगुण जाणावा. (२७)

उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती । ग्रामज्य आठवे चित्तीं ।
आवडे नीचाची संगती । तो रजोगुण ॥ २८ ॥

मादक किंवा धुंदी, नशा आणणल्या द्रव्याची ज्यास अत्यंत आवड असते, विषयासक्ती व गुंडपणा याचेच जो चिंतन करतो व ज्याला नीच लोकांची संगती आवडते, तो रजोगुण जाणावा. (२८)

तश्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे ।
नित्यनेमास मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥

ज्याला चोरीची विद्या शिकावी असे वाटते, लोकांचे दोष, कमीपणा बोलून दाखवणे आवडते, नित्यनेमाला ज्याचे मन विटते, तो रजोगुण होय. (२९)

देवकारणीं लाजाळु । उदरालागीं कष्टाळु ।
प्रपंची जो स्नेहाळु । तो रजोगुण ॥ ३० ॥

देवाचे कार्य करण्याची ज्याला लाज वाटते जो पोटासाठी वाटेल तितके कष्ट उपसण्यास तयार असतो आणि प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते, तो रजोगुण. (३०)

गोडग्रासीं आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण ।
रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥

ज्याला गोडधोड पदार्थांची आसक्ती असते, अत्यंत आदराने जो देहाचे पोषण करतो आणि ज्यास उपास करणे आवडत नाही, तो माणूस रजोगुणी जाणावा. (३१)

शृंगारिक तें आवडे । भक्ती वैराग्य नावडे ।
कळालाघवीं पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥

ज्यास शृंगारिक गोष्टींची आवड असते, भक्ती, वैराग्य वगैरे मुळीच आवडत नाही व जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यात प्रवीण असतो, तो रजोगुण. (३२)

नेणोनियां परमात्मा । सकळ पदार्थी प्रेमा ।
बळात्कारें घाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥

परमात्म्यास जो जाणत नाही आणि त्यामुळे जो सर्व दृश्य पदार्थावरच खरे प्रेम करीत असतो, त्यामुळे ज्यास पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, तो रजोगुण. (३३)

असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण ।
प्रपंची तो सबळ जाण । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥

याप्रमाणे हा रजोगुण आसक्तीमुळे वारंवार जन्ममरण भोगायला लावतो व प्रपंचांतही त्याच्या प्राबल्यामुळे दारुण दुःख भोगावे लागते. (३४)

आतां रजोगुण हा सुटेना । संसारिक हें तुटेना ।
प्रपंचीं गुंतली वासना । यास उपाय कोण ॥ ३५ ॥

आता हा रजोगुण तर सुटता सुटत नाही, त्यामुळे या संसारचक्रातून सुटका होत नाही. वासना प्रपंचातच गुंतून राहते, तरी यावर उपाय काय? (३५)

उपाये येक भगवद्भवक्ती । जरी ठाकेना विरक्ती ।
तरी येथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥

त्यावर श्री समर्थ म्हणतात की, यावर भगवद्‌भक्ती हा एकच उपाय आहे. आपल्या ठिकाणी जरी वैराग्य नसले तरी यथाशक्ती भगवद्‌भजन करावे. (३६)

काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
ईश्वरीं अर्पूनियां मनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥

काया, वाचा आणि मनाने, पत्र, पुष्प, फळ अथवा पाणी जे काही उपलब्ध असेल, ते मनाने ईश्वरास अर्पण करून जीवनाचे सार्थक करावे. (३७)

येथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंतीं अनन्य ।
सुखदुःखें परी चिंतन । देवाचेंचि करावें ॥ ३८ ॥

यथाशक्ती दान, पुण्य करीत जावे व कुठल्याही परिस्थितीत, सुखात अथवा दुःखात चिंतन देवाचेच करावे. भगवंतालाच सदैव अनन्य शरण असावे. (३८)

आदि‍अंती येक देव । मध्येंचि लाविली माव ।
म्हणोनियां पूर्ण भाव । भगवंतीं असावा ॥ ३९ ॥

या विश्वाच्या आदी व अंती एक देवच आहे. मध्ये उगीचच ही माया भुलवते. म्हणून पूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणीच असावा. (३९)

ऐसा सबळ रजोगुण । संक्षेपें केलें कथन ।
आतां शुद्ध तो तूं जाण । परमार्थिक ॥ ४० ॥

शबल रजोगुण हा असा आहे. त्याचे येथे थोडक्यात वर्णन केले आहे. आता शुद्ध रजोगुण जो पारमार्थिक असतो, तोही तू जाणून घे. (४०)

त्याचे वोळखीचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण ।
तो रजोगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥

सत्त्वगुणाच्या वर्णनांतच त्याच्या ओळखीची चिन्हे सापडतात. तो शुद्ध रजोगुणच भजनाचे मूळ आहे. म्हणून तो पूर्णतः जाणून घ्यावा. (४१)

ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुमानिला ।
आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥

याप्रमाणे येथे रजोगुणाचे वर्णन केले आहे, ते श्रोत्यांनी अनुमानाने जाणून घेतले असेलच. आता पुढे तमोगुणाचे वर्णन केले आहे. तेही श्रवण करावे. (४२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
रजोगुणलक्षणनाम समास पांचवा ॥ ५ ॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘रजोगुणलक्षणनाम’ समास पाचवा समाप्त

समास सहावा : तमोगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण ।
आतां ऐका तमोगुण । तोहि सांगिजेल ॥ १ ॥

श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले आहे. आता तमोगुणाचे वर्णन करतो, तेही ऐका. (१)

संसारीं दुःखसंमंध । प्राप्त होतां उठे खेद ।
कां अद्भुुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ २ ॥

प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला असता जो अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो, तो तमोगुण समजावा. (२)

शेरीरीं क्रोध भरतां । नोळखे माता पिता ।
बंधु बहिण कांता । ताडी, तो तमोगुण ॥ ३ ॥

जेव्हा शरीरात क्रोधाचा संचार होतो, तेव्हा तो आईवडिलांनाही ओळखत नाही. एवढेच नव्हे तर भाऊ, बहीण, बायको यांनाही मारू लागतो, तो तमोगुण होय. (३)

दुसर्यामचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा ।
विसरवी जीवभावा । तो तमोगुण ॥ ४ ॥

दुसऱ्याचा प्राण घ्यावा, किंवा आपला स्वतःचा जीव घ्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो, तेव्हा तो तमोगुण. (४)

भरलें क्रोधाचें काविरें । पिश्याच्यापरी वावरे ।
नाना उपायें नावरे । तो तमोगुण ॥ ५ ॥

ज्या वेळी क्रोधाचा आवेग येतो, तेव्हा जणू शरीरात पिशाच्याचा संचार झाल्यासारखा जो वागतो व नाना उपाय करूनही जो आवरत नाही तो तमोगुण. (५)

आपला आपण शस्त्रपात । पराचा करी घात ।
ऐसा समय वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥

प्रसंगी आपण आपल्यालाच शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्याचा घात करावा असे वाटणे, हा तमोगुणच होय. (६)

डोळा युध्यचि पाहवें । रण पडिलें तेथें जावें ।
ऐसें घेतलें जीवें । तो तमोगुण ॥ ७ ॥

जेव्हा डोळ्यांनी युद्धच पाहावे असे वाटते, जेथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते, तो तमोगुणच असतो. (७)

अखंड भ्रांती पडे । केला निश्चय विघडे ।
अत्यंत निद्रा आवडे । तो तमोगुण ॥ ८ ॥

ज्याच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो, एखादा निश्चय केला तर तो टिकत नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते तो तमोगुण होय. (८)

क्षुधा जयाची वाड । नेणे कडु अथवा गोड ।
अत्यंत जो कां मूढ । तो तमोगुण ॥ ९ ॥

ज्याची भूक अनावर असल्याने जो कडू गोड इत्यादी जाणतच नाही, असा जो अत्यंत मूढ असतो, तो तमोगुण. (९)

प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें ।
स्वयें आत्महत्या करणें । तो तमोगुण ॥ १० ॥

आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो स्वतः जीव देण्यास, प्रवृत्त होतो, तो तमोगुण होय. (१०)

किडा मुंगी आणी स्वापद । यांचा करूं आवडे वध ।
अत्यंत जो कृपामंद । तो तमोगुण ॥ ११ ॥

ज्याला किडा, मुंगी, श्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते, ज्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो तो तमोगुण होय. (११)

स्त्रीहत्या बाळहत्या । द्रव्यालागीं ब्रह्मत्या ।
करूं आवडे गोहत्या । तो तमोगुण ॥ १२ ॥

ज्याला स्त्रीहत्या, बालहत्या, एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रह्महत्या, गोहत्यादी करणे आवडते तो तमोगुण जाणावा. (१२)

विसळाचेनि नेटें । वीष घ्यावेंसें वाटे ।
परवध मनीं उठे । तो तमोगुण ॥ १३ ॥

नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व जो दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा करतो, तो तमोगुण होय. (१३)

अंतरीं धरूनि कपट । पराचें करी तळपट ।
सदा मस्त सदा उद्धट । तो तमोगुण ॥ १४ ॥

जो मनात कपट धरून दुसऱ्याचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो, जो सदा मस्त आणि उद्धट असतो, तो तमोगुण समजावा. (१४)

कळह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी ऐसें उठे ।
अन्तरी द्वेष प्रगटे । तो तमोगुण ॥ १५ ॥

कुणाशी तरी भांडावे, कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्याबद्दल द्वेष प्रगट होणे, हे तमोगुणाचे कार्य होय. (१५)

युध्य देखावें ऐकावें । स्वयें युध्यचि करावें ।
मारावें कीं मरावें । तो तमोगुण ॥ १६ ॥

युद्ध डोळ्यांनी पाहावे, कानांनी युद्धाच्या वार्ता ऐकाव्या, एवढेच नव्हे, तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे हा तमोगुणच. (१६)

मत्सरें भक्ति मोडावी । देवाळयें विघडावीं ।
फळतीं झाडें तोडावीं । तो तमोगुण ॥ १७ ॥

जो कुणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी, देवालये पाडावी, फळे येणारी झाडे तोडून टाकावी, असे ज्यास वाटते तो तमोगुण होय. (१७)

सत्कर्में ते नावडती । नाना दोष ते आवडती ।
पापभय नाहीं चित्ती । तो तमोगुण ॥ १८ ॥

ज्याला सत्कर्मे आवडत नाहीत तर नाना दोषच आवडतात व ज्याच्या चित्तात पापाचे भय जराही नसते, तो तमोगुण होय. (१८)

ब्रह्मवृत्तीचा उछेद । जीवमात्रास देणें खेद ।
करूं आवडे अप्रमाद । तो तमोगुण ॥ १९ ॥

ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे ज्यास आवडते, जीवमात्रास दुःख देणे व अती पाप करणेच ज्याला आवडते, तो तमोगुण जाणावा. (१९)

आग्नप्रळये शस्त्रप्रळये । भूतप्रळये वीषप्रळये ।
मत्सरें करीं जीवक्षये । तो तमोगुण ॥ २० ॥

जो आगी लावतो, शस्त्रांनी लोकांचा घात करतो, जो भूतप्रेतबाधा करून लोकांना छळतो, लोकांना विष घालतो, मत्सराने लोकांचा जीवही घेतो, तो तमोगुण होय. (२०)

परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास ।
संसाराचा नये त्रास । तो तमोगुण ॥ २१ ॥

लोकांना पीडा देण्यात ज्याला संतोष वाटतो, निष्ठुरपणाचा जो हव्यास धरतो आणि संसारासाठी कष्ट करण्यास जो त्रासत नाही, तो तमोगुणच जाणावा. (२१)

भांडण लाऊन द्यावें । स्वयें कौतुक पाहावें ।
कुबुद्धि घेतली जीवें । तो तमोगुण ॥ २२ ॥

लोकांमध्ये भांडण लावून द्यावे व स्वतः ती मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते, तो तमोगुणच होय. (२२)

प्राप्त जालियां संपत्ती । जीवांस करी यातायाती ।
कळवळा नये चित्तीं । तो तमोगुण ॥ २३ ॥

स्वतःस संपत्ती प्राप्त झाली असताही जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो, ज्याला अंतःकरणात थोडाही कळवळा येत नाही तो तमोगुणच. (२३)

नावडे भक्ति नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव ।
वेदशास्त्र नलगे सर्व । तो तमोगुण ॥ २४ ॥

ज्यास भक्ती आवडत नाही, भाव आवडत नाही, तीर्थयात्रा व देवही आवडत नाही व वेदशास्त्रादी ज्यास नकोसे वाटते, तो तमोगुणच होय. (२४)

स्नानसंध्या नेम नसे । स्वधर्मीं भ्रष्टला दिसे ।
अकर्तव्य करीतसे । तो तमोगुण ॥ २५ ॥

जो स्नानसंध्यादी कुठलाही नेम करीत नाही; स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला दिसतो आणि जे करू नये तेच जो करतो, तो तमोगुण समजावा. (२५)

जेष्ठ बंधु बाप माये । त्यांचीं वचनें न साहे ।
सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ॥ २६ ॥

मोठा भाऊ, आईवडील यांचे बोलणे ज्यास सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्रकोपी घरच सोडून निघून जातो, तो तमोगुण होय. (२६)

उगेंचि खावें उगेंचि असावें । स्तब्ध हो‍ऊन बैसावें ।
कांहींच स्मरेना स्वभावें । तो तमोगुण ॥ २७ ॥

उगीचच खावे, काहीच न करता बसून राहावे, ज्याला स्वाभाविकरीत्याच काहीच स्मरत नाही, तो तमोगुण जाणावा. (२७)

चेटकविद्येचा अभ्यास । शस्त्रविद्येचा हव्यास ।
मल्लविद्या व्हावी ज्यास । तो तमोगुण ॥ २८ ॥

जारणमारणादी चेटकविद्येचा जो अभ्यास करतो, शस्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मल्लविद्या यावी अशी जो इच्छा धरतो, तो तमोगुण होय. (२८)

केले गळाचे नवस । रडिबेडीचे सायास ।
काष्ठयंत्र छेदी जिव्हेस । तो तमोगुण ॥ २९ ॥

जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे, किंवा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा काष्ठयंत्राने जीभ कापून घेण्याचे नवस करतो, तो तमोगुण. (२९)

मस्तकीं भदें जाळावें । पोतें आंग हुरपळावें ।
स्वयें शस्त्र टोचून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३० ॥

मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याचे तप्त खापर जाळावे, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतःस शस्त्र टोचून घ्यावे, हा तमोगुणच जाणावा. (३०)

देवास सिर वाहावें । कां तें आंग समर्पावें ।
पडणीवरून घालून घ्यावे । तो तमोगुण ॥ ३१ ॥

आपले मस्तक देवास वाहावे, किंवा एखादा अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून द्यावे, हे सर्व तमोगुणाचे कार्य होय. (३१)

निग्रह करून धरणें । कां तें टांगून घेणें ।
देवद्वारीं जीव देणें । तो तमोगुण ॥ ३२ ॥

जो देवाच्या दारी निग्रहाने, हट्टाने धरणे धरतो, किंवा स्वतःस टांगून घेतो, किंवा देवद्वारी जीव देतो, तो तमोगुण जाणावा. (३२)

निराहार उपोषण । पंचाग्नी धूम्रपान ।
आपणास घ्यावें पुरून । तो तमोगुण ॥ ३३ ॥

जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करतो, अथवा पंचाग्निसाधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून व डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो, अथवा धूम्रपानाचे साधन करतो, किंवा स्वतःस पुरून घेतो, तो तमोगुणच होय. (३३)

सकाम जें का अनुष्ठान । कां तें वायोनिरोधन ।
अथवा राहावें पडोन । तो तमोगुण ॥ ३४ ॥

काही कामना धरून जो अनुष्ठान करतो, किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो, तो तमोगुण जाणावा. (३४)

नखें केश वाढवावे । हस्तचि वर्ते करावे ।
अथवा वाग्सुंन्य व्हावें । तो तमोगुण ॥ ३५ ॥

जो नखे, केस वाढवतो, हात वर करून उभा राहातो किंवा जो एकदम मौनच राहातो, तो तमोगुणच होय. (३५)

नाना निग्रहें पिडावें । देहदुःखें चर्फडावें ।
क्रोधें देवांस फोडावें । तो तमोगुण ॥ ३६ ॥

नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यावयाची आणि देहास दुःख झाले की चरफडायचे व रागारागाने देवालाच फोडायचे, हे तमोगुणाचे कार्य असते. (३६)

देवाची जो निंदा करी । तो आशाबद्धि अघोरी ।
जो संतसंग न धरी । तो तमोगुण ॥ ३७ ॥

जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही करीत नाही, तो तमोगुण होय. (३७)

ऐसा हा तमोगुण । सांगतां जो असाधारण ।
परी त्यागार्थ निरूपण । कांहीं येक ॥ ३८ ॥

तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे, पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन येथे केले आहे. (३८)

ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनास कारण ।
मोक्षप्राप्तीचें लक्षण । नव्हे येणें ॥ ३९ ॥

वर सांगितल्याप्रमाणे जे वर्तन असते, तो तमोगुण होय; पण हा अधोगतीसच कारण होतो. याच्यायोगे मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. (३९)

केल्या कर्माचें फळ । प्राप्त हो‍ईल सकळ ।
जन्म दुःखाचें मूळ । तुटेना कीं ॥ ४० ॥

माणूस जसे कर्म करतो, त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावे लागते. तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म त्यातून सुटका होत नाही. (४०)

व्हावया जन्माचें खंडण । पाहिजे तो सत्वगुण ।
तेंचि असे निरुपण । पुढिले समासीं ॥ ४१ ॥

जन्मच नको असेल तर त्याचे खंडण होण्याकरिता सत्त्वगुण आवश्यक आहे. म्हणून पुढील समासात त्या सत्त्वगुणाचेच निरूपण केले आहे. (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
तमोगुणलक्षणनाम समास सहावा ॥ ६ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘तमोगुणलक्षणनाम’ समास सहावा समाप्त.

समास सातवा : सत्त्वगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण ।
आतां ऐका सत्वगुण । परम दुल्लभ ॥ १ ॥

श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात अत्यंत दारुण दुःख देणारा जो तमोगुण त्याचे वर्णन केले. आता परम दुर्लभ अशा सत्त्वगुणाचे वर्णन ऐकावे. (१)

जो भजनाचा आधार । जो योगियांची थार ।
जो निरसी संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥

भजनाला म्हणजेच भगवद्‌भक्तीला सत्त्वगुणाचा आधार असतो. योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवतात आणि सत्त्वगुणामुळे दुःखमूळ जो संसार त्याचे निरसन होते. (२)

जेणें होये उत्तम गती । मार्ग फुटे भगवंतीं ।
जेणें पाविजे मुक्ती । सायोज्यता ते ॥ ३ ॥

उत्तम गती सत्त्वगुणामुळेच प्राप्त होते व भगवद्‌भक्तीचा मार्ग सापडून सायुज्यता मुक्तीही प्राप्त होते. (३)

जो भक्तांचा कोंवसा । जो भवार्णवींचा भर्वसा ।
मोक्षलक्ष्मीची दशा । तो सत्वगुण ॥ ४ ॥

सत्त्वगुण हा भक्तांची कणव करणारा त्यांचा सखा आहे. तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाचा मदतनीस आहे. मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजे सत्त्वगुणच होय. (४)

जो परमार्थाचें मंडण । जो महंतांचें भूषण ।
रजतमाचें निर्शन । तो सत्वगुण ॥ ५ ॥

सत्त्वगुण परमार्थाची शोभा आहे, संत-महंतांचे ते भूषण आहे आणि रजोगुण व तमोगुणांचे निरसन सत्त्वगुणामुळेच होतो. (५)

जो परमसुखकारी । जो आनंदाची लहरी ।
दे‍ऊनियां, निवारी- । जन्ममृत्य ॥ ६ ॥

सत्त्वगुण परम सुख देणारा असून तो स्वात्मसुखाचा अनुभव देऊन जन्ममृत्यूचे निवारण करतो. (६)

जो अज्ञानाचा सेवट । जो पुण्याचें मूळ पीठ ।
जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥

सत्त्वगुणामुळेच अज्ञानाचा नाश होतो. पुण्याचा मूळ आधार सत्त्वगुणच आहे व त्यामुळे परलोकाची वाट सापडते. (७)

ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण ।
तये क्रियेचें लक्षण । ऐसें असे ॥ ८ ॥

असा हा सत्त्वगुण देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रगट होतो, तेव्हा आचरणात जो बदल घडून येतो, त्या क्रियेचे लक्षण असे असते. (८)

ईश्वरीं प्रेमा अधिक । प्रपंच संपादणे लोकिक ।
सदा सन्निध विवेक । तो सत्वगुण ॥ ९ ॥

परमेश्वराविषयी अधिक प्रेम उत्पन्न होते, प्रपंच चारचौघांसारखा लौकिकरीत्या केला जातो आणि सदा सर्वकाळ अंतःकरणात विवेक जागृत राहतो, हे सत्त्वगुणाचे लक्षण होय. (९)

संसारदुःख विसरवी । भक्तिमार्ग विमळ दावी ।
भजनक्रिया उपजवी । तो सत्वगुण ॥ १० ॥

सत्त्वगुणामुळे संसारदुःखाचा विसर पडतो, निर्मळ अशा भक्तिमार्गाचे ज्ञान होते व भजनाची आवड उत्पन्न होते. (१०)

परमार्थाची आवडी । उठे भावार्थाची गोडी ।
परोपकारीं तांतडी । तो सत्वगुण ॥ ११ ॥

परमार्थाची आवड उत्पन होऊन परमात्म्याविषयी भावभक्ती वाढू लागते व परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते. (११)

स्नानसंध्या पुण्यसीळ । अभ्यांतरींचा निर्मळ ।
शरीर वस्त्रें सोज्वळ । तो सत्वगुण ॥ १२ ॥

स्नानसंध्यादी आचार आवडणे, शरीर व वस्त्रे यांची निर्मलता ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत. (१२)

येजन आणी याजन । आधेन आणी अध्यापन ।
स्वयें करी दानपुण्य । तो सत्वगुण ॥ १३ ॥

यज्ञयाग करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन करणे व दान व पुण्यकर्मे करणे हे सत्त्वगुणच करवितो. (१३)

निरूपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी ।
क्रिया पालटे रोकडी । तो सत्वगुण ॥ १४ ॥

जेथे वेदान्त- निरूपणाची आवड असते, हरिकथेत गोडी वाटते व आचरणात तत्काळ चांगला बदल होतो तो सत्त्वगुण जाणावा. (१४)

अश्वदानें गजदानें । गोदानें भूमिदानें ।
नाना रत्नांचीं दानें- । करी, तो सत्वगुण ॥ १५ ॥

अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात, तो सत्त्वगुण होय. (१५)

धनदान वस्त्रदान । अन्नदान उदकदान ।
करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६ ॥

संपत्तीचे दान, वस्त्राचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मणसंतर्पण ही कार्ये सत्त्वगुणाची आहेत. (१६)

कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें ।
निःकाम तीर्थें उपोषणे । तो सत्वगुण ॥ १७ ॥

कार्तिकस्‍नाने, माघसस्‍नाने, निरनिराळी व्रते, त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा व उपोषणे असतील, तेथे सत्त्वगुण जाणावा. (१७)

सहस्रभोजनें लक्षभोजनें । विविध प्रकारींचीं दानें ।
निःकाम करी सत्वगुणें । कामना रजोगुण ॥ १८ ॥

सहस्रभोजने, लक्षभोजने, विविध प्रकारची दाने इत्यादी जेथे निष्काम बुद्धीने घडते, तो सत्त्वगुण होय. सकामता ही रजोगुणामुळे उत्पन्न होते. (१८)

तीर्थीं अर्पी जो अग्रारें । बांधे वापी सरोवरें ।
बांधे देवाळयें सिखरें । तो सत्वगुण ॥ १९ ॥

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे, विहिरी बांधणे, देवळे व देवळांची शिखरे बांधणे हा सत्त्वगुण होय. (१९)

देवद्वारीं पडशाळा । पाईरीया दीपमाळा ।
वृंदावनें पार पिंपळा- । बांधे, तो सत्वगुण ॥ २० ॥

देवद्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या व दीपमाळा बांधणे, तुळशी वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्त्वगुणच आहे. (२०)

लावीं वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें ।
निववी तापस्यांचीं मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥

वने, उपवने, पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे, हे सत्त्वगुणाचे कार्य आहे. (२१)

संध्यामठ आणि भुयेरीं । पाईरीया नदीतीरीं ।
भांडारगृहें देवद्वारीं । बांधें, तो सत्वगुण ॥ २२ ।

संध्यामठ व ध्यानासाठी गुहा बांधणे, नदीतीरी घाट बांधणे अथवा देवद्वारी भांडारगृह बांधणे हे असेल तेथे सत्त्वगुण जाणावा. (२२)

नाना देवांचीं जे स्थानें । तेथें नंदादीप घालणें ।
वाहे आळंकार भूषणें । तो सत्वगुण ॥ २३ ॥

निरनिराळ्या देवस्थानांच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे, हा सत्त्वगुण होय. (२३)

जेंगट मृदांग टाळ । दमामे नगारे काहळ ।
नाना वाद्यांचे कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥

झेंगट, मृदुंग, टाळ दमामा, नगारे ,काहळ वगैरे सुस्वर वाद्यादिकांचा कल्लोळ जेथे असेल तो सत्त्वगुण होय. (२४)

नाना समग्री सुंदर । देवाळईं घाली नर ।
हरिभजनीं जो तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥

अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवालयाला अर्पण करतो, आणि जो हरिभजनी तत्पर असतो, तो सत्त्वगुण होय. (२५)

छेत्रें आणी सुखासनें । दिंड्या पताका निशाणें ।
वाहे चामरें सूर्यापानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥

छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज (निशाणे), चामर अबदागिरी वगैरे जो देवास वाहतो, तो सत्त्वगुण होय. (२६)

वृंदावनें तुळसीवने । रंगमाळा संमार्जनें ।
ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण ॥ २७ ॥

वृंदावने, तुळसीवने, सडासंमार्जन, रांगोळ्या यांची अंतःकरणात आवड उत्पन्न होते, तो सत्त्वगुण होय. (२७)

सुंदरें नाना उपकर्णें । मंडप चांदवे आसनें ।
देवाळईं समर्पणें । तो सत्वगुण ॥ २८ ॥

नाना सुंदर उपकरणी, मंडप, चांदवे, आसने देवालयाला समर्पण करणे हा सत्त्वगुणच आहे. (२८)

देवाकारणें खाद्य । नाना प्रकारीं नैवेद्य ।
अपूर्व फळें अर्पी सद्य । तो सत्वगुण ॥ २९ ॥

देवासाठी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, नाना प्रकारचे नैवेद्य, उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो, तो सत्त्वगुण होय. (२९)

ऐसी भक्तीची आवडी । नीच दास्यत्वाची गोडी ।
स्वयें देवद्वार झाडी । तो सत्वगुण ॥ ३० ॥

अशी भक्तीची अत्यंत आवड जेथे असते, देवाचे हलक्यातील हलके काम करण्यातही जिथे गोडी वाटते व स्वतः देवद्वार झाडतो, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३०)

तिथी पर्व मोहोत्साव । तेथें ज्याचा अंतर्भाव ।
काया वाचा मनें सर्व- । अर्पी, तो सत्वगुण ॥ ३१ ॥

निरनिराळ्या तिथींना, पर्वकाळी व महोत्सवात जो सहभागी होतो व काया-वाचा-मनाने जो सर्व ईश्वरास अर्पण करतो, तो सत्त्वगुणच होय. (३१)

हरिकथेसी तत्पर । गंधें माळा आणी धुशर ।
घे‍ऊन उभीं निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥

जे लोक हरिकथेस तत्पर असतात व गंध, माळ बुक्का इत्यादी घेऊन देवद्वारी उभे असतात, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३२)

नर अथवा नारी । येथानुशक्ति सामग्री ।
घे‍ऊन उभीं देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३३ ॥

स्त्रिया अथवा पुरुष शक्तीस अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवद्वारी उभी असतात, तो सत्त्वगुणच होय. (३३)

महत्कृत्य सांडून मागें । देवास ये लागवेगें ।
भक्ति निकट आंतरंगें । तो सत्वगुण ॥ ३४ ॥

जो महत्त्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो व ज्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयी जवळीक असून भक्तिभाव असतो, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३४)

थोरपण सांडून दुरी । नीच कृत्य आंगीकारी ।
तिष्ठत उभा देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३५ ॥

जो अभिमान सोडून देऊन हलक्यात हलकी सेवाही स्वीकारतो व सदा देवद्वारात तिष्ठत उभा असतो तो सत्त्वगुण होय. (३५)

देवालागीं उपोषण । वर्जी तांबोल भोजन ।
नित्य नेम जप ध्यान- । करी, तो सत्वगुण ॥ ३६ ॥

जो भगवंताच्या कृपेसाठी उपोषण करतो व भोजन, तांबूल इत्यादी भोगसामग्रीचा त्याग करून नित्यनेमाने जपध्यानादी करतो, तो सत्त्वगुणच असतो. (३६)

शब्द कठीण न बोले । अतिनेमेसी चाले ।
योगू जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥ ३७ ॥

जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो व जो योगी लोकांना संतोष देतो, तो सत्त्वगुणच जाणावा. (३७)

सांडूनिया अभिमान । निःकाम करी कीर्तन ।
श्वेद रोमांच स्फुराण । तो सत्वगुण ॥ ३८ ॥

जो अभिमान सोडून निष्काम भावनेने कीर्तन करतो व त्या प्रसंगी स्वेद, रोमांच, स्फुरण इत्यादी अष्ट सात्त्विकभाव जेथे प्रगट होतात, तो सत्त्वगुण होय. (३८)

अंतरीं देवाचें ध्यान । तेणें निडारले नयन ।
पडे देहाचें विस्मरण । तो सत्वगुण ॥ ३९ ॥

ज्याच्या अंतरी सदा देवाचे ध्यान लागलेले असते व भक्तिभावामुळे ज्याचे डोळे पाण्याने भरून येतात व जो देहाचे भानही विसरतो, तो सत्त्वगुणच जाणावा. (३९)

हरिकथेची अति प्रीति । सर्वथा नये विकृती ।
आदिक प्रेमा आदि‍अंतीं । तो सत्वगुण ॥ ४० ॥

ज्यास हरिकथेची अत्यंत प्रीती असते व कधी चुकूनही कंटाळा येत नाही, उलट सुरुवातीस व शेवटीही अधिकच प्रेम दिसून येते, तो सत्त्वगुणच असतो. (४०)

मुखीं नाम हातीं टाळी । नाचत बोले ब्रीदावळी ।
घे‍ऊन लावी पायधुळी । तो सत्वगुण ॥ ४१ ॥

जो मुखाने भगवंताचे नाव उच्चारत, हाताने टाळ्या वाजवत, आनंदाने नाचत नाचत भगवंताचे गुणानुवाद व ब्रीदावळी गातो, तसेच भगवद्‌भक्तांची पायधूळ आपल्या मस्तकी धारण करतो, तो सत्त्वगुण होय. (४१)

देहाभिमान गळे । विषईं वैराग्य प्रबळे ।
मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥

ज्यायोगे देहाभिमान नष्ट होतो, विषयासंबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या हे कळू लागते, तो सत्त्वगुण जाणावा. (४२)

कांहीं करावा उपाये । संसारीं गुंतोन काये ।
उकलवी ऐसें हृदये । तो सत्वगुण ॥ ४३ ॥

या भवसागरातून तरून जाण्याचा काही तरी उपाय करावा, या संसारात गुंतून काय होणार आहे, असे अंतरंगात तीव्रपणे जेव्हां वाटू लागते, तेव्हां तो सत्त्वगुण समजावा. (४३)

संसारासी त्रासे मन । कांहीं करावें भजन ।
ऐसें मनीं उठे ज्ञान । तो सत्वगुण ॥ ४४ ॥

प्रपंचाच्या योगे मन त्रासून जाते व काहीतरी भगवद्‌भजन करावे असे ज्ञान अंतःकरणात स्फुरण पावू लागते, तो सत्त्वगुण. (४४)

असतां आपुले आश्रमीं । अत्यादरें नित्यनेमी ।
सदा प्रीती लागे रामीं । तो सत्वगुण ॥ ४५ ॥

आपापल्या आश्रमात असता जो अत्यंत आदराने नित्यनेम पाळतो व ज्याचे चित्त अत्यंत प्रेमाने सदा भगवंताचे चरणी जडलेले असते, तो सत्त्वगुण जाणावा. (४५)

सकळांचा आला वीट । परमार्थीं जो निकट ।
आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥ ४६ ॥

ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो व जो सदा परमार्थाच्या निकट असतो व संकटकाळी जो धैर्य धारण करतो, तो सत्त्वगुण. (४६)

सर्वकाळ उदासीन । नाना भोगीं विटे मन ।
आठवे भगवद्भसजन । तो सत्वगुण ॥ ४७ ॥

जो सदासर्वकाळ विषयभोगाविषयी उदासीन असतो, विविध भोगांविषयी ज्याचे मन विटलेले असते व ज्यास भगवद्‌भजनच सर्वकाळ आठवते, तो सत्त्वगुण जाणावा. (४७)

पदार्थीं न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत ।
ऐसा दृढ भावार्थ । तो सत्वगुण ॥ ४८ ॥

ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूवर आसक्त होत नाही, मनात जो अखंड भगवंताचे स्मरण करीत असतो, असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो, तो सत्त्वगुण होय. (४८)

लोक बोलती विकारी । तरी आदिक प्रेमा धरी ।
निश्चय बाणे अंतरीं । तो सत्वगुण ॥ ४९ ॥

त्याचे भगवत्‌प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात पण त्याचे भगवत्‌प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवद्‌भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो, तो सत्त्वगुण जाणावा. (४९)

अंतरीं स्फूर्ती स्फुरे । सस्वरूपीं तर्क भरे ।
नष्ट संदेह निवारे । तो सत्वगुण ॥ ५० ॥

ज्या वेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपासंबंधीच्या विचारांनी मन भरून जाते व वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात, तो सत्त्वगुण होय. (५०)

शरीर लावावें कारणीं । साक्षेप उठे अंतःकर्णी ।
सत्वगुणाची करणी । ऐसी असे ॥ ५१ ॥

हे मनुष्यशरीर कारणी लावावे असा प्रयत्न करण्याविषयी जेव्हा मनाचा दृढ निश्चय होतो, तेव्हा तो सत्त्वगुण जाणावा. (५१)

शांति क्ष्मा आणि दया । निश्चय उपजे जया ।
सत्वगुण जाणावा तया । अंतरीं आला ॥ ५२ ॥

ज्याच्या अंतःकरणात शांती, क्षमा, दया असतात व भगवद्‌भक्तीसंबंधी दृढ निश्चय झालेला असतो, त्याच्या अंतःकरणात सत्त्वगुण येऊन राहिला आहे असे जाणावे. (५२)

आले अतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त ।
येथानुशक्ती दान देन । तो सत्वगुण ॥ ५३ ॥

अतिथि-अभ्यागत आले असता जो त्यांना विमुख, भुकेले धाडीत नाही व जो यथाशक्ती दान देतो, तो सत्त्वगुण जाणावा. (५३)

तडितापडी दैन्यवाणें । आलें आश्रमाचेनि गुणें ।
तयालागीं स्थळ देणें । तो सत्वगुण ॥ ५४ ॥

तपस्वी, बैरागी अथवा कुणी दुःखी दैन्यवाणा आश्रयास आला असता गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून जो त्यांना राहाण्यास जागा देतो, तो सत्त्वगुण होय. (५४)

आश्रमीं अन्नची आपदा । परी विमुख नव्हे कदा ।
शक्तिनुसार दे सर्वदा । तो सत्वगुण ॥ ५५ ॥

आपल्या घरात पुरेसे अन्‍न नसले तरी जो कुणाला विमुख पाठवीत नाही आणि नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो, तो सत्त्वगुण. (५५)

जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना ।
जयास नाहीं कामना । तो सत्वगुण ॥ ५६ ॥

ज्याने जिव्हेवर विजय मिळविलेला असतो, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात व मनात कोणतीही कामना नसते, तो सत्त्वगुण होय. (५६)

होणार तैसें होत जात । प्रपंचीं जाला आघात ।
डळमळिना ज्याचें चित्त । तो सत्वगुण ॥ ५७ ॥

जे होणार ते होतच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी ज्याचे चित्त डळमळत नाही, तेथे सत्त्वगुण जाणावा. (५७)

येका भगवंताकारणें । सर्व सुख सोडिलें जेणें ।
केलें देहाचें सांडणें । तो सत्वगुण ॥ ५८ ॥

केवळ एका भगवंताकरिताच ज्याने सर्व सुखांचा त्याग केलेला असतो, एवढेच नव्हे, तर आपला देहही भगवत्‌चरणी समर्पण केलेला असतो, तो सत्त्वगुण. (५८)

विषईं धांवे वासना । परी तो कदा डळमळिना ।
ज्याचें धारिष्ट चळेना । तो सत्वगुण ॥ ५९ ॥

मनात विषयवासना आली तरी जो कधी डळमळत नाही व ज्याचे मनोधैर्य कधी ढळत नाही, तो सत्त्वगुण समजावा. (५९)

देह आपदेनें पीडला । क्षुधे तृषेनें वोसावला ।
तरी निश्चयो राहिला । तो सत्वगुण ॥ ६० ॥

शरीर दारिद्र्याने अथवा रोगाने पीडलेले असले, तहानभुकेने व्याकूळ झालेले असले, तरी ज्याचा परमार्थाचा निश्चय टिकून राहातो तो सत्त्वगुण होय. (६०)

श्रवण आणी मनन । निजध्यासें समाधान ।
शुद्ध जालें आत्मज्ञान । तो सत्वगुण ॥ ६१ ॥

जो श्रवण, मनन, निदिध्यास जाणीवपूर्वक सातत्याने करतो त्यास शुद्ध आत्मज्ञान होऊन समाधान लाभते. हे सर्व सत्त्वगुणाचे कार्य होय (६१)

जयास अहंकार नसे । नैराशता विलसे ।
जयापासीं कृपा वसे । तो सत्वगुण ॥ ६२ ॥

ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो, अनासक्ती सदा विलसत असते व जो अत्यंत कृपाळू असतो, तो सत्त्वगुण होय. (६२)

सकळांसीं नम्र बोले । मर्यादा धरून चाले ।
सर्व जन तोषविले । तो सत्वगुण ॥ ६३ ॥

जो सर्वांशी नम्रपणे बोलतो, ज्याचे वागणे मर्यादशील असते व जो सर्व लोकांना संतोष देतो, तो सत्त्वगुण जाणावा. (६३)

सकळ जनासीं आर्जव । नाहीं विरोधास ठाव ।
परोपकारीं वेची जीव । तो सत्वगुण ॥ ६४ ॥

जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व प्रेमाने वागतो, त्यामुळे विरोधास जागाच उरत नाही व जो परोपकारासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घालतो, तो सत्त्वगुण समजावा. (६४)

आपकार्याहून जीवीं । परकार्यसिद्धी करावी ।
मरोन कीर्ती उरवावी । तो सत्वगुण ॥ ६५ ॥

जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून प्रयत्नशील असतो, मेल्यावरही कीर्तिरूपाने जो अमर होतो, तो सत्त्वगुण होय. (६५)

पराव्याचे दोषगुण । दृष्टीस देखे आपण ।
समुद्राऐसी साठवण । तो सत्वगुण ॥ ६६ ॥

दुसऱ्याचे दोष, गुण दिसले तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रगट करीत नाही, तो सत्त्वगुण जाणावा. (६६)

नीच उत्तर साहाणें । प्रत्योत्तर न देणें ।
आला क्रोध सावरणें । तो सत्वगुण ॥ ६७ ॥

कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो व जशास तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला तरी जो आवरून धरतो, तो सत्त्वगुण होय. (६७)

अन्यायेंवीण गांजिती । नानापरी पीडा करिती ।
तितुकेंहि साठवी चित्तीं । तो सत्वगुण ॥ ६८ ॥

जरी कुणी काहीही कारण नसताना अन्यायाने छळत असून, नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही जो मोठ्या मनाने चित्तात साठवतो, (त्याच्यासंबंधी विरुद्ध भावना ज्याच्या मनातही येत नाही,) तो सत्त्वगुण समजावा. (६८)

शरीरें घीस साहाणें । दुर्जनासीं मिळोन जाणें ।
निंदकास उपकार करणें । हा सत्वगुण ॥ ६९ ॥

देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशीही मिळून मिसळून वागतो व निंदा करणाऱ्यावरही जो उपकारच करतो, तो सत्त्वगुण असतो. (६९)

मन भलतीकडे धावें । तें विवेकें आवराअवें ।
इंद्रियें दमन करावें । तो सत्वगुण ॥ ७० ॥

मन भलतीकडे धावू लागले तरी जो विवेकाने त्यास आवरतो व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो, तो सत्त्वगुण होय. (७०)

सत्क्रिया आचरावी । असत्क्रिया त्यागावी ।
वाट भक्तीची धरावी । तो सत्वगुण ॥ ७१ ॥

सत्कर्मेच करावी, दुष्कर्मांचा त्याग करावा आणि भक्तिमार्गाचेच अनुसरण करावे असे वाटणे, हा सत्त्वगुण. (७१)

जया आवडे प्रातःस्नान । आवडे पुराणश्रवण ।
नाना मंत्रीं देवतार्चन- । करी, तो सत्वगुण ॥ ७२ ॥

ज्याला प्रातःस्‍नान करणे आवडते, पुराणश्रवणात व नाना मंत्रांनी देवतार्चन करण्यात ज्याला गोडी वाटते, तो सत्त्वगुण होय. (७२)

पर्वकाळीं अतिसादर । वसंतपूजेस तत्पर ।
जयंत्यांची प्रीती थोर । तो सत्वगुण ॥ ७३ ॥

ज्याला पर्वकाळबद्दल फार आदर असतो, जो वसंतपूजा करण्याविषयी तत्पर असतो व देवतांच्या जयंत्यादी उत्सव करण्याची ज्याला गोडी असते, तो सत्त्वगुण. (७३)

विदेसिं मेलें मरणें । तयास संस्कार देणें ।
अथवा सादर होणें । तो सत्वगुण ॥ ७४ ॥

कुणी परदेशी माणूस बेवारसाप्रमाणे मेला, तर त्याचा अंत्यसंस्कार करणे किंवा त्यास हजर राहणे, हे सत्त्वगुणाचे कार्य होय. (७४)

कोणी येकास मारी । तयास जाऊन वारी ।
जीव बंधनमुक्त करी । तो सत्वगुण ॥ ७५ ॥

कोणी कुणास मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडवतो, तो सत्त्वगुण होय. (७५)

लिंगें लाहोलीं अभिशेष । नामस्मरणीं विश्वास ।
देवदर्शनीं अवकाश । तो सत्वगुण ॥ ७६ ॥

लिंगार्चन करणे, पत्रपुष्पांची लाखोली वाहाणे, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे, हा सत्त्वगुण होय. (७६)

संत देखोनि धावें । परम सुख हेलावे ।
नमस्कारी सर्वभावें । तो सत्वगुण ॥ ७७ ॥

संतांना पाहून जो त्यांचे दर्शनासाठी धांव घेतो व त्यांच्या दर्शनाने परमसुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत घालतो, तो सत्त्वगुण जाणावा. (७७)

संतकृपा होय जयास । तेणें उद्धरिला वंश ।
तो ईश्वराचा अंश । सत्वगुणें ॥ ७८ ॥

संतांची कृपा ज्याच्यावर होते, त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्त्वगुणामुळेच त्याच्या ठिकाणीचा ईश्वरांश प्रगट होतो. (७८)

सन्मार्ग दाखवी जना । जो लावी हरिभजना ।
ज्ञान सिकवी अज्ञाना । तो सत्वगुण ॥ ७९ ॥

जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवद्‌भक्तीच्या मार्गास लावतो व अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश देतो, तो सत्त्वगुण समजावा. (७९)

आवडे पुण्य संस्कार । प्रदक्षणा नमस्कार ।
जया राहे पाठांतर । तो सत्वगुण ॥ ८० ॥

ज्यास पुण्य, संस्कार आवडतात, देवास प्रदक्षिणा, नमस्कार करणे आवडते व ज्याचे पाठांतर उत्तम असते, तो सत्त्वगुण होय. (८०)

भक्तीचा हव्यास भारी । ग्रंथसामग्री जो करी ।
धातुमूर्ति नानापरी । पूजी, तो सत्वगुण ॥ ८१ ॥

ज्याला भक्तीचा अंतःकरणपूर्वक हव्यास असतो. जो ग्रंथ जवळ बाळगतो व धातुमूर्तीचीही नानाप्रकारे पूजा करतो, तो सत्त्वगुण असतो. (८१)

झळफळित उपकर्णें । माळा गवाळी आसनें ।
पवित्रे सोज्वळें वसनें । तो सत्वगुण ॥ ८२ ॥

देवपूजेची स्वच्छ चकचकीत उपकरणे, जपमाळ, उपासनामूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुखी व पवित्र व स्वच्छ, सोज्वळ वस्त्रे हे सर्व ज्यास आवडते तो सत्त्वगुण होय. (८२)

परपीडेचें वाहे दुःख । परसंतोषाचें सुख ।
वैराग्य देखोन हरिख- । मानी, तो सत्वगुण ॥ ८३ ॥

जो लोकांचे दुःख, पीडा, कष्ट पाहून दुःखी होतो, लोकांचा संतोष पाहून ज्यास सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो, तो सत्त्वगुण असतो. (८३)

परभूषणें भूषण । परदूषणें दूषण ।
परदुःखें सिणे जाण । तो सत्वगुण ॥ ८४ ॥

जो लोकांचे भूषण ते आपले भूषण मानतो, लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो, परदुःखाने जो कष्टी होतो, तो सत्त्वगुण जाणावा. (८४)

आतां असों हें बहुत । देवीं धर्मीं ज्याचें चित्त ।
भजे कामनारहित । तो सत्वगुण ॥ ८५ ॥

आता हे वर्णन पुरे झाले, थोडक्यात असे म्हणता येईल की, ज्याचे चित्त देवाधर्माचे ठिकाणी जडलेले असते आणि जो निष्काम भावनेने भगवद्‌भजन करतो तो सत्त्वगुण होय. (८५)

ऐसा हा सत्वगुण सात्विक । संसारसागरीं तारक ।
येणें उपजे विवेक । ज्ञानमार्गाचा ॥ ८६ ॥

असा हा सत्त्वगुण अत्यंत सात्त्विक असून तो संसारसागरातून तारून नेणारा आहे. त्याच्या योगानेच ज्ञानमार्गाचा विवेक उत्पन्न होतो. (८६)

सत्वगुणें भगवद्भ क्ती । सत्वगुणें ज्ञानप्राप्ती ।
सत्वगुणें सायोज्यमुक्ती । पाविजेते ॥ ८७ ॥

सत्त्वगुणानेच भगवद्‌भक्ती प्राप्त होते, सत्त्वगुणानेच ज्ञानप्राप्ती होऊन त्यानेच सायुज्यमुक्तीही मिळते. (८७)

ऐसी सत्वगुणाची स्थिती । स्वल्प बोलिलें येथामती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ८८ ॥

याप्रमाणे सत्त्वगुणाची स्थिती येथे थोडक्यात यथामती वर्णन केली आहे. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे काय सांगतो ते ऐकावे. (८८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सत्वगुणनाम समास सातवा ॥ ७ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सत्त्वगुणक्षणनाम’ समास सातवा समाप्त

समास आठवा : सद्‌विद्यानिरूपण

॥ श्रीराम ॥

ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें ।
विचार घेतां बळेंचि बाणे । सद्विद्या आंगीं ॥ १ ॥

आता परम शुद्ध व अती उत्तम अशी सद्‌विद्येची लक्षणे वर्णन करून सांगतो, ती श्रोत्यांनी ऐकावी. त्यांच्यासंबंधी विचार केला असता आपोआपच ती अंगी बाणतात. (१)

सद्विद्येचा जो पुरुष । तो उत्तमलक्षणी विशेष ।
त्याचे गुण ऐकतां संतोष । परम वाटे ॥ २ ॥

जो सद्‌विद्यायुक्त पुरुष असतो, तो विशेष उत्तमगुणांनी युक्त असतो. त्याचे गुण ऐकूनसुद्धा परम संतोष वाटतो. (२)

भाविक सात्विक प्रेमळ । शांति क्ष्मा दयासीळ ।
लीन तत्पर केवळ । अमृतवचनी ॥ ३ ॥

तो भाविक, सात्त्विक, प्रेमळ, शांती, क्षमा व दया यांनी युक्त, लीन, कार्य करण्यात तत्पर आणि केवळ अमृतासारखी मधुरवचने बोलणारा असतो. (३)

परम सुंदर आणी चतुर । परम सबळ आणी धीर ।
परम संपन्न आणी उदार । आतिशयेंसीं ॥ ४ ॥

तो परम सुंदर परम चतुर परम बलवान आणि परम धैर्यशील असून परमसंपन्न असून अत्यंत उदार असतो. (४)

परम ज्ञाता आणी भक्त । माहा पंडीत आणी विरक्त ।
माहा तपस्वी आणी शांत । आतिशयेंसीं ॥ ५ ॥

तो परम ज्ञानी, परम भक्त, महापंडित असून विरक्त आणि महातपस्वी असून अत्यंत शांत असतो. (५)

वक्ता आणी नैराशता । सर्वज्ञ आणी सादरता ।
श्रेष्ठ आणी नम्रता । सर्वत्रांसी ॥ ६ ॥

तो उत्तम वक्ता असून अनासक्त असतो. सर्वज्ञ असून लोकांना आदर देणारा असतो आणि श्रेष्ठ असूनही अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागणारा असतो. (६)

राजा आणी धार्मिक । शूर आणी विवेक ।
तारुण्य आणी नेमक । आतिशयेंसीं ॥ ७ ॥

तो राजा असूनही धार्मिक असतो. शूर असूनही विवेकी असतो. तरुण असूनही अत्यंत नीतिनियमाने वागणारा असतो. (७)

वृधाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी ।
धन्वंतरी परोपकारी । पद्महस्ती ॥ ८ ॥

तो वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म, कुळाचार पाळणार, युक्त आहार घेणारा व कुठल्याही विकाराच्या आधीन न होणार, वैद्यक विद्या जाणणारा, परोपकारी व ज्याच्या हातावर यशाचे प्रतीक असे कमलाचे चिन्ह आहे, असा असतो. (८)

कार्यकर्ता निराभिमानी । गायक आणी वैष्णव जनी ।
वैभव आणी भगवद्भभजनी । अत्यादरें ॥ ९ ॥

उत्तम कार्यकर्ता असून तो निरभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवद्‌भक्त असतो, वैभवसंपन्न असून अतिआदराने भगवद्‌भजन करणारा असतो. (९)

तत्वज्ञ आणी उदासीन । बहुश्रुत आणी सज्जन ।
मंत्री आणी सगुण । नीतिवंत ॥ १० ॥

तो तत्त्वज्ञानी असून उदासीन म्हणजे विरक्त असतो; बहुश्रुत असूनही सज्जन असतो आणि राजाचा मंत्री असूनही सद्‌गुणसंपन्न व नीतिमान असतो. (१०)

आधु पवित्र पुण्यसीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ ।
कर्मनिष्ठ स्वधर्में निर्मळ । निर्लोभ अनुतापी ॥ ११ ॥

तो पवित्र पुण्यशील साधू असून शुद्ध अंतःकरणाचा, कृपाळू व धर्मात्मा असतो. स्वधर्मनिष्ठ निर्मळ कर्मनिष्ठ (निष्काम कर्मयोगी) व निर्लोभी असून तो अनुतापाने विशुद्ध अंतःकरणाचा झालेला असतो. (११)

गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती ।
श्रुति स्मृती लीळा युक्ति । स्तुती मती परीक्षा ॥ १२ ॥

त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते व प्रेमही असते. तो सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्‌क्रिया करणारा उत्तम धारणाशक्ती असणारा व धैर्यशील असतो. श्रुती, स्मृती यांचे त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते, भगवंताच्या लीलांविषयी त्यास प्रेम असून भगवंताची स्तुती कशी करावी हेही तो जाणतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती व वस्तूंची उत्तम पारख त्यास असते. (१२)

दक्ष धूर्त योग्य तार्किक । सत्यसाहित्य नेमक भेदक ।
कुशळ चपळ चमत्कारिक । नाना प्रकारें ॥ १३ ॥

तो नेहमी सावध असून वेळप्रसंग पाहून वागणारा, रीतीने व प्रमाणात तर्क जाणणारा, सत्‌साहित्याची आवड असणारा, नेमनिष्ठ व पारदर्शी, कुशल, चपळ व नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असतो. (१३)

आदर सन्मान तार्तम्य जाणे । प्रयोगसमयो प्रसंग जाणे ।
कार्याकारण चिन्हें जाणे । विचक्षण बोलिका ॥ १४ ॥

कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा, यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशाप्रकारे वागायचे, हे वेळप्रसंग पाहून तो अचूक जाणतो, कार्यकारणसंबंधाची त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. (१४)

सावध साक्षेपी साधक । आगम निगम शोधक ।
ज्ञानविज्ञान बोधक । निश्चयात्मक ॥ १५ ॥

तो सदा सावध, कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादी शास्त्रांचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान व आत्मानुभव दोन्ही असल्याने दुसऱ्यास ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देऊ शकतो. (१५)

पुरश्चरणी तीर्थवासी । धृढव्रती कायाक्लेसी ।
उपासक, निग्रहासी- । करूं जाणे ॥ १६ ॥

तो तीर्थक्षेत्रात वास करणारा व नाना मंत्रांची पुरश्चरणे करणार, दृढव्रती, शरीरकष्टाची तमा बाळगणारा व इंद्रियनिग्रह करून उपासना करणारा असतो. (१६)

सत्यवचनी शुभवचनी । कोमळवचनी येकवचनी ।
निश्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ ॥

तो नेहमी सत्यभाषण करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एकनिष्ठेने पाळणारा व कोमल शब्द उच्चारणारा असतो. सदासर्वकाळ तो निश्चयात्मक व दुसऱ्यास सौख्य होईल, असेच बोलतो. (१७)

वासनातृप्त सखोल योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी ।
सौम्य सात्विक शुद्धमार्गी । निःकपट निर्वेसनी ॥ १८ ॥

त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्त्व भव्य आणि सुप्रसन्न असते. तो वैराग्यसंपन्न असूनही सौम्य व सात्त्विक असतो. तसेच निष्कपटी, निर्व्यसनी असून नेहमी शुद्ध मार्गाचे अनुसरण करणारा असतो. (१८)

सुगड संगीत गुणग्राही । अनापेक्षी लोकसंग्रही ।
आर्जव सख्य सर्वहि । प्राणीमात्रासी ॥ १९ ॥

तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणकार व गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो व सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वाने व सरलतेने वागणारा असतो. (१९)

द्रव्यसुची दारासुची । न्यायसुची अंतरसुची ।
प्रवृत्तिसुची निवृत्तिसुची । सर्वसुची निःसंगपणें ॥ २० ॥

द्रव्याचे, पति-पत्नी संबंधाचे, न्याय-अन्यायाचे, अंतःकरणाचे, तसेच प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे प्रपंच व परमार्थातील पावित्र्य अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निःसंग वृत्तीमुळे दिसून येते. (२०)

मित्रपणें परहितकारी । वाग्माधुर्य परशोकहारी ।
सामर्थ्यपणें वेत्रधारी । पुरूषार्थें जगमित्र ॥ २१ ॥

तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहिततत्पर असतो, मधुर वाणीने लोकांच्या दुःखाचे तो हरण करतो, सामर्थ्यसंपन्न असल्याने दुसऱ्यांचे संरक्षण करतो आणि पौरुषसंपन्न असल्याने सर्व जगाचा मित्र बनतो. (२१)

संशयछेदक विशाळ वक्ता । सकळ क्लृप्त असोनी श्रोता ।
कथानिरूपणीं शब्दार्था । जाऊंच नेदी ॥ २२ ॥

सर्वसमावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो व म्हणून सर्व संशयांचे तो निरसन करू शकतो. स्वतः अत्यंत विद्वान व ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथानिरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. (२२)

वेवादरहित संवादी । संगरहित निरोपाधी ।
दुराशारहित अक्रोधी । निर्दोष निर्मत्सरी ॥ २३ ॥

वादविवाद टाळून संवाद करणे त्याला जमते. तो निःसंग वृत्तीचा असल्याने कुठलीही उपाधी आपल्यामागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही व कुणावर कधी क्रोधही करीत नाही. असा तो सदा निर्मत्सरी व निर्दोष असतो. (२३)

विमळज्ञानी निश्चयात्मक । समाधानी आणी भजक ।
सिद्ध असोनी साधक । साधन रक्षी ॥ २४ ॥

तो संदेहरहित विमलज्ञानाने युक्त असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंताचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनाचे रक्षण करीत एखाद्या साधकाप्रमाणेच राहतो. (२४)

सुखरूप संतोषरूप । आनंदरूप हास्यरूप ।
ऐक्यरूप आत्मरूप । सर्वत्रांसी ॥ २५ ॥

तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्याने त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिमंत सुख वा संतोषच त्याच्या रूपाने प्रगट झाले आहेत असे वाटते. तो नेहमी आनंदी, सुप्रसन्न, स्मितहास्य ज्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असा दिसतो. (२५)

भाग्यवंत जयवंत । रूपवंत गुणवंत ।
आचारवंत क्रियावंत । विचारवंत स्थिती ॥ २६ ॥

तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचारसंपन्न असून क्रियाशील व सुविचारी असतो. (२६)

येशवंत किर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत ।
वीर्यवंत वरदवंत । सत्यवंत सुकृती ॥ २७ ॥

तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिसंपन्न, सामर्थ्यवान, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात, असा सत्यवंत व पुण्यकर्मे करणाराही असतो. (२७)

विद्यावंत कळावंत । लक्ष्मीवंत लक्ष्णवंत ।
कुळवंत सुचिष्मंत । बळवंत दयाळु ॥ २८ ॥

तो विद्यावंत, कलावंत असतो. ऐश्वर्यसंपन्न असून उत्तम लक्षणांनी युक्त असतो. कुलीन असून पवित्र आचरणाचा असतो व बलशाली असूनही दयाळू असतो (२८)

युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ । बुद्धिवंत बहुधारिष्ट ।
दीक्षावंत सदासंतुष्ट । निस्पृह वीतरागी ॥ २९ ॥

तो युक्तिप्रयुक्ती जाणणारा, गुणसंपन्न, वरिष्ठ व बुद्धिमान असून धैर्यशीलही असतो. त्याने गुरूकडून दीक्षा घेतलेली असते व तो सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते व तो अत्यंत वैराग्यसंपन्न असतो. (२९)

असो ऐसे उत्तम गुण । हें सद्विद्यचें लक्षण ।
अभ्यासाया निरूपण । अल्पमात्र बोलिलें ॥ ३० ॥

असो. याप्रमाणे येथे जे उत्तम गुण सांगितले आहेत, ते सद्‌विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणूनच त्यांचे थोडेसे वर्णन केले आहे. (३०)

रूपलावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ ३१ ॥

रूपाचे सौंदर्य हे काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. जे उपजत गुण असतात, त्यांत परिवर्तन घडवून आणता येत नाही. तेथे काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो, त्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. (३१)

ऐसी सद्विद्या बरवी । सर्वत्रांपासी असावी ।
परी विरक्तपुरुषें अभ्यासवी । अगत्यरूप ॥ ३२ ॥

याप्रमाणे ही उत्तम अशी विद्या सर्वांपाशीच असावी असे समर्थ सांगतात. निदान विरक्त पुरुषांनी तरी अगत्याने तिचा अभ्यास करावा. (३२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सद्विद्यानिरूपणनाम समास आठवा ॥ ८ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सद्‌विद्यानिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.

समास नववा : विरक्तलक्षण

॥ श्रीराम ॥

ऐका विरक्तांची लक्षणें । विरक्तें असावें कोण्या गुणें ।
जेणें आंगीं सामर्थ्य बाणें । योगियाचें ॥ १ ॥

श्रीसमर्थ म्हणतात की, आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो ती ऐका. विरक्त पुरुषाच्या अंगी कोणते गुण हवेत ते प्रथम सांगतो. कारण वैराग्यामुळे योग्याचे अंगी सामर्थ्य बाणते व योग सिद्धीस जातो. (१)

जेणें सत्कीर्ति वाढे । जेणें सार्थकता घडे ।
जेणेंकरितां महिमा चढे । विरक्तांसी ॥ २ ॥

विरक्तीमुळेच उत्तम कीर्ती मिळते, मनुष्यजन्माचे सार्थक होते व वैराग्यसंपन्न मनुष्यास थोरवी प्राप्त होते. (२)

जेणें परमार्थ फावे । जेणें आनंद हेलावे ।
जेणें विरक्ति दुणावे । विवेकेंसहित ॥ ३ ॥

या गुणामुळे स्वस्वरूपसाक्षात्कार होतो, त्यामुळे आनंद उचंबळून येतो आणि विवेकासहित वैराग्यही दुपटीने वाढू लागते. (३)

जेणें सुख उचंबळे । जेणें सद्विद्या वोळे ।
जेणें भाग्यश्री प्रबळे । मोक्षेंसहित ॥ ४ ॥

त्या गुणांनीच सुख उचंबळून येते, सद्‌विद्येची प्राप्ती होते आणि मोक्षासहित सर्व भाग्य व ऐश्वर्य यांनी जीवन संपन्न बनते. (४)

मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती ।
मुखीं राहे सरस्वती । मधुर बोलावया ॥ ५ ॥

सर्व मनोरथ पूर्ण होतात, सर्व कामनांची पूर्तता होते आणि मधुर बोलण्याकरिता जणू सरस्वतीच जिभेवर येऊन राहते. (५)

हे लक्षणें श्रवण कीजे । आणी सदृढ जीवीं धरिजे ।
तरी मग विख्यात हो‍ईजे । भूमंडळीं ॥ ६ ॥

आता जी लक्षणे सांगतो, ती ऐकून हृदयात अत्यंत दृढपणे धारण करा, म्हणजे मग तो मनुष्य या जगात प्रसिद्धी मिळवतो. (६)

विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें ।
विरक्तें धारिष्ट धरावें । दमनविषईं ॥ ७ ॥

विरक्त माणसाने विवेकाने वागावे. त्याने जगात अध्यात्माचा प्रचार करावा व इंद्रियांवर ताबा ठेवण्यासंबंधी धैर्य धारण करावे. (७)

विरक्तें राखावें साधन । विरक्तें लावावें भजन ।
विरक्तें विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटवावें ॥ ८ ॥

विरक्त पुरुषाने साधनाचा कधीही त्याग करू नये. त्याने लोकांमध्ये भगवद्‌भजनाची आवड उत्पन्न करावी आणि विशेषेकरून आपल्या वाणीने आणि आचरणाने जगात ब्रह्मज्ञान लोकांना स्पष्ट करून सांगावे. (८)

विरक्तें भक्ती वाढवावी । विरक्ते शांती दाखवावी ।
विरक्तें येत्नें करावी । विरक्ती आपुली ॥ ९ ॥

विरक्ताने लोकांत भक्तिमार्गाचा प्रचार करावा, त्याने आपल्या वागण्याने शांती कशी असते, हे लोकांना दाखवून द्यावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावे. (९)

विरक्तें सद्क्रि या प्रतिष्ठावी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी ।
विरक्तें नैराशता धरावी । सदृढ जिवेंसीं ॥ १० ॥

विरक्ताने सत्‌क्रियेचा आदर करून समाजात तिची प्रतिष्ठापना करावी. त्याने विरक्तीचा, अनासक्तीचा प्रचार करावा आणि स्वतःही प्रयत्नपूर्वक निःसंगता दृढपणे हृदयी धारण करावी. (१०)

विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति आवलंबावी ।
विरक्तें क्ष्मा सांभाळावी । अत्यादरेंसी ॥ ११ ॥

विरक्ताने धर्मस्थापना करावी. स्वतः नेहमी नीतीस धरून वागावे आणि अत्यंत आदराने क्षमाशील वृत्ती जतन करावी. (११)

विरक्तें परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा ।
विरक्तें सन्निध ठेवावा । सन्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥

विरक्ताने परमार्थाचे पुनरुज्जीवन करावे. त्याने नित्यानित्य-विवेक करावा व नेहमी सत्त्वगुणाचे रक्षण करून त्याच्या साह्याने सन्मार्गाचे आचरण करावे. (१२)

विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निववावीं ।
विरक्तें साबडीं नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३ ॥

विरक्ताने भाविकांना आधार द्यावा, भगवद्‌भक्ताची अंतःकरणे निववावी आणि जे भोळेभाबडे लोक भगवंतास शरण आले असतील, त्यांची कधीही उपेक्षा करू नये. (१३)

विरक्तें असावें परम दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष ।
विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥

विरक्ताने नेहमी सावध असावे, दुसऱ्याचे अंतरंग जाणून घ्यावे आणि परमार्थ वाढेल असा प्रयत्न कमवा. (१४)

विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा ।
विरक्तें वग्त्रृत्वें उभारावा । मोडला परमार्थ ॥ १५ ॥

विरक्ताने नेहमी शास्त्राभ्यास, योगाभ्यास, ध्यानाभ्यास इत्यादी अभ्यास करावा. त्याने नेहमी प्रयत्नशील असावे आणि परमार्थ मार्गासंबंधी लोकांची उदासीनता, आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या बळावर दूर करून परत अज्ञ लोकांना परमार्थाकडे वळवावे. (१५)

विरक्तें विमळज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य स्तवीत जावें ।
विरक्तें निश्चयाचें करावें । समाधान ॥ १६ ॥

विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करावा, त्याने वैराग्याची स्तुती करावी व लोकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना नि संदेह असे समाधान मिळवून द्यावे. (१६)

पर्वें करावीं अचाटें । चालवावी भक्तांची थाटे ।
नाना वैभवें कचाटें । उपासनामार्ग ॥ १७ ॥

विरक्ताने अत्यंत उत्साहाने निरनिराळे पर्वकाळ व महोत्सव साजरे करावे. त्यानिमित्ताने मोठ्या आदराने, थाटाने भक्तांचे समुदाय एकत्रित करावेत आणि प्रयत्नपूर्वक अत्यंत वैभवाने थाटामाटात त्या महोत्सवात भजन, कीर्तन, प्रवचनादी उपासनामार्गांचे अवलंबन करावे. (१७)

हरिकीर्तनें करावीं । निरूपणें माजवावीं ।
भक्तिमार्गे लाजवावीं । निंदक दुर्जनें ॥ १८ ॥

त्याने हरिकीर्तने करावी. प्रवचने, निरूपणे यांची एकच गर्दी करून सोडावी आणि भक्तिमार्गाचा आवेशाने प्रचार करावा की, त्यायोगे निंदक, दुर्जन यांना लाज वाटावी. (१८)

बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार ।
पुण्यमार्गाचा विस्तार । बळेंचि करावा ॥ १९ ॥

अनेकांवर परोपकार करावा, उत्तम आचाराचा जीर्णोद्धार करावा आणि प्रयत्नपूर्वक पुण्यमार्गाचा प्रचार प्रसार करावा. (१९)

स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भोजन ।
नित्यनेम पवित्रपण । अंतरशुद्ध असावें ॥ २० ॥

स्‍नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवद्‌भजन, तसेच नित्यनेम व पवित्रपणा यांचा त्याने स्वतः अवलंब करून लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व हे सर्व करीत असतां अंतःकरणही अत्यंत शुद्ध असावे. (२०)

दृढ निश्चयो धरावा । संसार सुखाचा करावा ।
विश्वजन उद्धरावा । संसर्गमात्रें ॥ २१ ॥

विरक्ताने दृढ निश्चयाने वागावे, सर्व लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि असे वागावे की केवळ संगतीनेही जगातील लोकांचा उद्धार होईल. (२१)

विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार ।
विरक्तें असावें तत्पर । निरूपणविषईं ॥ २२ ॥

विरक्ताने धीरगंभीर व अत्यंत उदार असावे. तसेच त्याने अध्यात्मनिरूपण करण्यातही नेहमी तत्पर असावे. (२२)

विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्ध मार्गें जावें ।
विरक्तें झिजोन उरवावें । सद्कीरर्तीसी ॥ २३ ॥

विरक्ताने नेहमी सावध असावे आणि नेहमी सन्मार्गानेच चालावे. लोकांसाठी शरीर झिजवून त्याने उत्तम कीर्तिरूपाने अमर व्हावे. (२३)

विरक्तें विरक्त धुंडावे । विरक्तें साधु वोळखावे ।
विरक्तें मित्र करावे । संत योगी सज्जन ॥ २४ ॥

विरक्ताने स्वतःसारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा, समाजातील साधुपुरुषांना ओळखून, संत, योगी, सजन इत्यादींचे बरोबर त्याने मित्रत्वाचे संबंध जोडावे. त्या सर्वांना आपलेसे करावे. (२४)

विरक्तें करावीं पुरश्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें ।
विरक्तें करावीं नानास्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥

विरक्ताने स्वतः नाना पुरश्चरणे करावीत, निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे, तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासनेस योग्य अशी परम रमणीय नाना स्थाने त्याने निर्माण करावी. (२५)

विरक्तें उपाधी करावी । आणि उदासवृत्ति न संडावी ।
दुराशा जडो नेदावी । कोणयेकविषईं ॥ २६ ॥

विरक्ताने लोकसंग्रह करावा पण स्वतः कोठेही आसक्त होऊ नये. कशाविषयीही भलती आशा कधीही बाळगू नये. (२६)

विरक्तें असावें अंतरनिष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट ।
विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधेनपणें ॥ २७ ॥

विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सुटू देऊ नये. आचारभ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये. (२७)

विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा ।
विरक्त चतुर असाअवा । सर्वप्रकारें ॥ २८ ॥

विरक्तास वेळप्रसंगाचे भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे. यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे जरूर आहे. (२८)

विरक्तें येकदेसी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें ।
विरक्तें अवघें जाणावें । ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥

विरक्ताने एकांगी कधी असू नये. त्याने प्रत्येक विषयाचा सर्व बाजूने अभ्यास करावा आणि जाणण्यायोग्य जे जे असेल, ते त्याने सर्व जाणून घ्यावे. (२९)

हरिकथा निरूपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान ।
पिंडज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥

त्याने भगवंताची सगुण चरित्रे जाणून घ्यावीत, वेदान्ताचे निरूपणही त्यास साध्य असावे. सगुणभजन व ब्रह्मज्ञान तसेच पिंडज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादी उपासनेतील निर्गुण, सगुण भेद वगैरेसंबंधी सर्व त्यास ज्ञात असावे. (३०)

कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावें ॥ ३१ ॥

परमात्मप्राप्तीचा कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धान्तमार्ग, प्रवृत्तिमार्ग, निवृत्तिमार्ग या सर्वांचे सखोल ज्ञान विरक्तास असावे. (३१)

प्रेमळ स्थिती उदास स्थिती । योगस्थिती ध्यानस्थिती ।
विदेह स्थिती सहज स्थिती । सकळ जाणावें ॥ ३२ ॥

भगवद्‌भक्ताची प्रेममय स्थिती किंवा ज्ञानी लोकांची उदासस्थिती, योग्यांची योगस्थिती व ध्यानी लोकांची ध्यानस्थिती तसेच जीवमुक्ताची विदेहावस्था व सहजावस्था यांचे अचूक व स्वानुभवजन्य ज्ञान विरक्त पुरुषास असावे. (३२)

ध्वनी लक्ष मुद्रा आसनें । मंत्र यंत्र विधी विधानें ।
नाना मतांचें देखणें । पाहोन सांडावें ॥ ३३ ॥

याशिवाय नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश व त्यांचे दर्शन, विविध प्रकारच्या मुद्रा, योगासने, विविध मंत्र आणि विविध प्रकारची यंत्रे, तसेच अनेक प्रकारची विधिविधाने व परमार्थ मार्गातील विविध प्रचलित मते या सर्वांचे ज्ञानही विरक्त पुरुषाने करून घेऊन नंतर वाटल्यास सोडून द्यावे. (३३)

विरक्तें असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र ।
विरक्तें असावें विचित्र । बहुगुणी ॥ ३४ ॥

विरक्त पुरुषाची सर्वांशी मैत्री असावी, तो जगन्मित्र असला, तरी त्याने पूर्ण स्वतंत्र असावे. विचित्र वाटतील असे अनेक गुणही त्याच्या ठिकाणी असावेत. थोडक्यात तो अनेक गुणांनी संपन्न असावा. (३४)

विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त ।
विरक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥

विरक्ताने नेहमी वैराग्यसंपन्न असणे जरूर आहे. तो हरिभक्त असावा. तसेच जीवन्मुक्त असून निःसंग असावा. (३५)

विरक्तें शास्त्रें धांडोळावीं । विरक्तें मतें विभांडावीं ।
विरक्तें मुमुक्षें लावावीं । शुद्धमार्गें ॥ ३६ ॥

विरक्ताने अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा, परमार्थास प्रतिकूल मतांचे त्याने खंडण करावे आणि मुमुक्षूंना शुद्ध परमार्थमार्ग कळावा म्हणून मार्गदर्शनही त्याने करावे. (३६)

विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा ।
विरक्तें आपला म्हणावा । विश्वजन ॥ ३७ ॥

विरक्ताने शुद्ध परमार्थ मार्गासंबंधी अचूक मार्गदर्शन करावे, लोकांच्या मनातील शंका, संशय यांचे निरसन त्याने करावे व सर्व विश्वातील लोकांवर प्रेम करावे. (३७)

विरक्तें निंदक वंदावें । विरक्तें साधक बोधावे ।
विरक्तें बद्ध चेववावे- । मुमुक्षनिरूपणें ॥ ३८ ॥

विरक्ताने आपल्या निंदकांनाही वंदन करावे. जे साधक असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करवा व जे बद्ध असतील त्यांना अध्यात्मनिरूपणाच्या योगे चेतवावे, स्वहिताचा विचार करण्यासाठी जागृत करावे. (३८)

विरक्तें उत्तम गुण घ्यावे । विरक्तें अवगुण त्यागावे ।
नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९ ॥

विरक्त पुरुषाने उत्तम गुण घ्यावेत, अवगुणांचा त्याग करावा व आपल्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अपायांचा विवेकाच्या बळावर नाश करावा. (३९)

ऐसीं हे उत्तम लक्षणें । ऐकावीं येकाग्र मनें ।
याचा अव्हेर न करणें । विरक्त पुरुषें ॥ ४० ॥

अशी ही विरक्त पुरुषाची उत्तम लक्षणे येथे सांगितली आहेत, विरक्त पुरुषाने ती एकाग्र मनाने श्रवण करावीत, त्यांचा अव्हेर करू नये. (४०)

इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें ।
श्रोतीं उदास न करावें । बहु बोलिलें म्हणौनी ॥ ४१ ॥

स्वाभाविकरीत्या मला जी पटली, ती मी येथे सहजपणे सांगितली आहेत, त्यांतील पटतील तितकी श्रोत्यांनी घ्यावी. मी फार बोललो म्हणून त्यांनी खिन्न होऊ नये. (४१)

परंतु लक्षणें ने घेतां । अवलक्षणें बाष्कळता ।
तेणें त्यास पढतमूर्खता । येवों पाहे ॥ ४२ ॥

परंतु ही उत्तम लक्षणे न घेता बाष्कळपणे जो अवलक्षणे घेतो, त्याच्या ठिकाणी पढतमूर्खता मात्र येते. (४२)

त्या पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण ।
बोलिलें असे सावधान- । हो‍ऊन आ‍इका ॥ ४३ ॥

त्या पढतमूर्खांची लक्षणे पुढील समासात वर्णन केली आहेत. तरी श्रोत्यांनी ती सावध होऊन ऐकावी. (४३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विरक्तलक्षणनाम समास नववा ॥ ९ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘विरक्तक्षणनाम’ समास नववा समाप्त.

समास दहावा : पढतमूर्खलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां सांगितलीं लक्षणें । मूर्खा‍आंगी चातुर्य बाणे ।
आतां ऐका शाहाणे- । असोनि, मूर्ख ॥ १ ॥

यापूर्वी ज्यायोगे मूर्ख माणूसही चतुर बनेल ती लक्षणे सांगितली. आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात, त्यांची लक्षणे ऐका. (१)

तया नांव पढतमूर्ख । श्रोतीं न मनावें दुःख ।
अवगुण त्यागितां , सुख- । प्राप्त होये ॥ २ ॥

अशा लोकांना पढतमूर्ख म्हणतात. यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे वाटले, तरी श्रोत्यांनी दुःख मानू नये. त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा, म्हणजे सुख लाभेल. (२)

बहुश्रुत आणि वित्पन्न । प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान ।
दुराशा आणि अभिमान । धरी, तो येक पढतमूर्ख ॥ ३ ॥

जो बहुश्रुत, थोर व्यासंगी आणि विद्वान आहे, ब्रह्मज्ञानही सुंदर रीतीने सांगतो, पण मनात दुराशा आणि अभिमान बाळगतो, तो एक पढतमूर्खच जाणावा. (३)

मुक्तक्रिया प्रतिपादी । सगुणभक्ति उछेदी ।
स्वधर्म आणि साधन निंदी । तो येक पढतमूर्ख ॥ ४ ॥

जो स्वेच्छाचाराचे प्रतिपादन करतो, सगुण भक्तीचे खंडण करतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो, तो पढतमूर्ख असतो. (४)

आपलेन ज्ञातेपणें । सकळांस शब्द ठेवणें ।
प्राणीमात्राचें पाहे उणें । तो येक पढतमूर्ख ॥ ५ ॥

जो स्वतःस फार विद्वान समजून इतर सर्वांना नावे ठेवतो, प्राणिमात्राचे ठिकाणी दोषच पाहतो, तोही पढतमूर्खच असतो. (५)

शिष्यास अवज्ञा घडे । कां तो संकटीं पडे ।
जयाचेनि शब्दें मन मोडे । तो येक पढतमूर्ख ॥ ६ ॥

जो शिष्यास अवज्ञा घडेल किंवा तो संकटात पडेल अशी आज्ञा करतो व ज्याच्या बोलण्याने इतरांच्या मनाला दुःख होते, असे मर्मभेदक शब्द बोलणाराही पढतमूर्खच असतो. (६)

रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिळ अंतःकर्णी ।
वैभव देखोन वाखाणी । तो येक पढतमूर्ख ॥ ७ ॥

जो रजोगुणी, तमोगुणी असतो, कपटी, कुटिल अंतःकरणाचा असतो आणि वैभवास भुलून श्रीमंत माणसाची स्तुती करू लागतो, तो पढतमूर्खच होय. (७)

समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ ८ ॥

जो एखादा ग्रंथ संपूर्ण न पाहता उगीचच त्यातील दोष काढून नावे ठेवतो, त्यांचे गुण सांगू लागले असता ते ऐकूनही न घेता दोषच पाहातो, तो पढतमूर्ख जाणावा. (८)

लक्षणें ऐकोन मानी वीट । मत्सरें करी खटपट ।
नीतिन्याय उद्धट । तो येक पढतमूर्ख ॥ ९ ॥

चांगली लक्षणे सांगायला गेले की ज्याला कंटाळा येतो, जो मत्सरग्रस्त होऊन नाना खटपटी, लटपटी करतो व ज्याला नीतिन्यायाची जराही चाड नसून जो उद्धट असतो, तोही पढतमूर्खच होय. (९)

जाणपणें भरीं भरे । आला क्रोध नावरे ।
क्रिया शब्दास अंतरे । तो येक पढतमूर्ख ॥ १० ॥

स्वतः आपण मोठे ज्ञानी आहोत, असे समजून जो हट्टास पेटतो, ज्याला राग आला तर आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच, तो पढतमूर्ख असतो. (१०)

वक्ता अधिकारेंवीण । वग्त्रृत्वाचा करी सीण ।
वचन जयाचें कठीण । तो येक पढतमूर्ख ॥ ११ ॥

योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि उगीचच बोलण्याचे कष्ट घेतो, ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते, तो पढतमूर्ख जाणावा. (११)

श्रोता बहुश्रुतपणें । वक्तयास आणी उणें ।
वाचाळपणाचेनि गुणें । तो येक पढतमूर्ख ॥ १२ ॥

एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो, पण वाचाळपणा करून वक्त्याचा अपमान करतो, तो पढतमूर्खच समजावा. (१२)

दोष ठेवी पुढिलांसी । तेंचि स्वयें आपणापासीं ।
ऐसें कळेना जयासी । तो येक पढतमूर्ख ॥ १३ ॥

जो ज्या गोष्टीसाठी लोकाला दोष देतो; पण स्वतः मात्र तीच गोष्ट करतो, असा स्वतःचे दोष न जाणणारा माणूस पढतमूर्खच असतो. (१३)

अभ्यासाचेनि गुणें । सकळ विद्या जाणे ।
जनास निवऊं नेणें । तो येक पढतमूर्ख ॥ १४ ॥

जो अभ्यासाच्या योगाने सर्व विद्यांचे ज्ञान करून घेतो, पण लोकांच्या अंतःकरणास सुख-समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही, तो पढतमूर्खच समजावा. (१४)

हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें ।
ऐसा जो प्रपंची गुंते । तो येक पढतमूर्ख ॥ १५ ॥

कोळिष्टकांच्या नाजूक धाग्याने हत्ती बंधनात सापडावा किंवा सुगंधाच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती करून घेण्यास समर्थ असूनही जो मायेच्या कोमल धाग्यांमुळे प्रपंचातच गुंतून पडतो, तो पढतमूर्खच होय. (१५)

स्त्रियंचा संग धरी । स्त्रियांसी निरूपण करी ।
निंद्य वस्तु आंगिकारी । तो येक पढतमूर्ख ॥ १६ ॥

जो स्त्रियांच्या संगतीत राहातो, स्त्रियांपुढेच ब्रह्मनिरूपण आणि निंद्य वस्तूंचे सेवन करतो, तो पढतमूर्ख. (१६)

जेणें उणीव ये आंगासी । तेंचि दृढ धरी मानसीं ।
देहबुद्धि जयापासीं । तो येक पढतमूर्ख ॥ १७ ॥

ज्यायोगे आपल्याला कमीपणा येईल तेच जो अंतःकरणात दृढ धरतो व देहबुद्धी ज्याची दृढ असते, तो पढतमूर्ख जाणावा. (१७)

सांडूनियां श्रीपती । जो करी नरस्तुती ।
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती- । वर्णी, तो येक पढतमूर्ख ॥ १८ ॥

लक्ष्मीपती भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो नरस्तुति करतो किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो, तो पढतमूर्खच असतो. (१८)

वर्णी स्त्रियांचे आवेव । नाना नाटकें हावभाव ।
देवा विसरे जो मानव । तो येक पढतमूर्ख ॥ १९ ॥

जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो, नाना नाटके, हावभाव, नकला करण्यात प्रवीण असतो, पण जो मनुष्य देवाला मात्र विसरतो तो पढतमूर्खच होय. (१९)

भरोन वैभवाचे भरीं । जीवमात्रास तुछ्य करी ।
पाषांडमत थावरी । तो येक पढतमूर्ख ॥ २० ॥

ऐश्वर्य प्राप्त झाले असता घमेंडीने जो जीवमात्रास तुच्छ समजतो, तसेच शास्त्रविरुद्ध मताचे प्रतिपादन करतो तोही पढतमूर्खच असतो. (२०)

वित्पन्न आणी वीतरागी । ब्रह्मज्ञानी माहायोगी ।
भविष्य सांगों लागे जगीं । तो येक पढतमूर्ख ॥ २१ ॥

जो बहुश्रुत विद्वान असतो, विरक्तही असतो एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञानी असून महायोगीही असतो; पण जो लोकांमध्ये भविष्य सांगू लागतो, तोसुद्धा पढतमूर्खच जाणावा. (२१)

श्रवण होतां अभ्यांतरीं । गुणदोषाची चाळणा करी ।
परभूषणें मत्सरी । तो येक पढतमूर्ख ॥ २२ ॥

काही श्रवण करीत असताना जो मनामध्ये त्यातील गुणदोषांसंबंधी चिंतन करू लागतो व दुसऱ्याचे चांगले पाहून जो त्याचा मत्सर करू लागतो, तोही पढतमूर्खच असतो. (२२)

नाहीं भक्तीचें साधन । नाहीं वैराग्य ना भजन ।
क्रियेविण ब्रह्मज्ञान- । बोले, तो येक पढतमूर्ख ॥ २३ ॥

जो भक्तीचे काही साधन करीत नाही, जो वैराग्यसंपन्न नसतो व काही भजन, पूजन इत्यादी क्रिया न करताच लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो, तो पढतमूर्ख होय. (२३)

न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र ।
पवित्रकुळीं जो अपवित्र । तो येक पढतमूर्ख ॥ २४ ॥

जो तीर्थक्षेत्र, वेद अथवा शास्त्र इत्यादी काहीच मानत नाही व पवित्रकुळी जन्मला असून ज्याचे आचरण अपवित्र असते, तो पढतमूर्ख समजावा. (२४)

आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।
सवेंचि निंदी अनादरी । तो येक पढतमूर्ख ॥ २५ ॥

जो आदर देतो, त्याची जो मनधरणी करतो, ज्याची योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो आणि नंतर स्वतः त्याची निंदा करतो, त्याचा अनादर करतो, तो एक पढतमूर्खच असतो. (२५)

मागें येक पुढें येक । ऐसा जयाचा दंडक ।
बोले येक करी येक । तो येक पढतमूर्ख ॥ २६ ॥

माणसाच्या तोंडावर एक बोलायचे व त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे अशी ज्याची वागण्याची रीत असते; जो बोलतो एक तर करतो दुसरेच, तो पढतमूर्खच समजावा. (२६)

प्रपंचविशीं सादर । परमार्थीं ज्याचा अनादर ।
जाणपणें घे अधार । तो येक पढतमूर्ख ॥ २७ ॥

जो प्रपंचाविषयी आदर बाळगतो व परमार्थाचा अनादर करतो आणि आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ शास्त्रवचनांचा वाटेल तसा आधार घेतो, तो पढतमूर्ख जाणावा. (२७)

येथार्थ सांडून वचन । जो रक्षून बोले मन ।
ज्याचें जिणें पराधेन । तो येक पढतमूर्ख ॥ २८ ॥

जो योग्य ते सांगायचे सोडून ऐकणाराचे मन राखण्यासाठी अयोग्यही बोलतो व ज्याचे जगणे परस्वाधीन लोकांवर अवलंबून असते, तोही पढतमूर्खच असतो. (२८)

सोंग संपाधी वरीवरी । करूं नये तेंचि करी ।
मार्ग चुकोन भरे भरीं । तो येक पढतमूर्ख ॥ २९ ॥

जो वर वर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो; पण (चोरून) जे करू नये तेच करतो, चांगला मार्ग सोडून हट्टाने आडमार्गास लागतो, तो पढतमूर्खच होय. (२९)

रात्रंदिवस करी श्रवण । न संडी आपले अवगुण ।
स्वहित आपलें आपण । नेणे तो येक पढतमूर्ख ॥ ३० ॥

जो रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत असूनही आपले अवगुण सोडत नाही, आपले स्वतःचे हित कशात आहे हे जो जाणत नाही, तो पढतमूर्ख असतो. (३०)

निरूपणीं भले भले । श्रोते ये‍ऊन बैसले ।
क्षुद्रें लक्षुनी बोले । तो येक पढतमूर्ख ॥ ३१ ॥

जो निरूपण करीत असताना मोठे अधिकारी श्रोते ऐकायला येऊन बसले असता जो त्यांची क्षुद्र न्यूने काढून बोलतो, तो पढतमूर्खच जाणावा. (३१)

शिष्य जाला अनधिकारी । आपली अवज्ञा करी ।
पुन्हां त्याची आशा धरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३२ ॥

ज्याचा शिष्य अनधिकारी झाल्याने गुरूची अवज्ञा करीत असतानाही जो तिकडे दुर्लक्ष करून परत त्या शिष्याची आशा धरतो, तो पढतमूर्खच असतो. (३२)

होत असतां श्रवण । देहास आलें उणेपण ।
क्रोधें करी चिणचिण । तो येक पढतमूर्ख ॥ ३३ ॥

श्रवण करीत असता जर देहधर्मामुळे त्यात अडथळा आला, उणीव भासू लागली, तर जो रागाने चिडचिड करतो, तो पढतमूर्खच होय. (३३)

भरोन वैभवाचे भरीं । सद्गु२रूची उपेक्षा करी ।
गुरुपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३४ ॥

आपल्या ऐश्वर्याच्या मदाने जो सद्‌गुरूची उपेक्षा करतो आणि गुरुपरंपरा कोणासही सांगत नाही, तो पढतमूर्ख जाणावा. (३४)

ज्ञान बोलोन करी स्वार्थ । कृपणा ऐसा सांची अर्थ ।
अर्थासाठीं लावी परमार्थ । तो येक पढतमूर्ख ॥ ३५ ॥

ज्ञानाच्या गोष्टी सांगून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूष माणसासारखा द्रव्यसंचय करतो, संपत्ती मिळविण्यासाठी जो परमार्थाचा उपयोग करतो, तो पढतमूर्ख समजावा. (३५)

वर्तल्यावीण सिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी ।
पराधेन गोसावी । तो येक पढतमूर्ख ॥ ३६ ॥

जो स्वत: तसे आचरण न करता लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो. वास्तविक कुणी विचारल्याखेरीज सांगू नये अशी ब्रह्मज्ञानाविषयीची शास्त्राज्ञा पण ती मोडून जो पोटासाठी सर्रास सर्वांना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व महंत असून पराधीन होऊन राहतो, तो पढतमूर्खच असतो. (३६)

भक्तिमार्ग अवघा मोडे । आपणामध्यें उपंढर पडे ।
ऐसिये कर्मीं पवाडे । तो येक पढतमूर्ख ॥ ३७ ॥

जी कर्मे केली असता भक्तिमार्गात विघ्न येते आणि स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होऊन जाते अशी कर्मे करण्यास जो मागेपुढे पाहात नाही, तो पढतमूर्ख जाणावा. (३७)

प्रपंच गेला हातीचा । लेश नाहीं परमार्थाचा ।
द्वेषी देवां ब्राह्मणाचा । तो येक पढतमूर्ख ॥ ३८ ॥

हातचा प्रपंचही गेला व अंतःकरणात परमार्थाचा लेशही नाही, असा जो देवा-ब्राह्मणांचा द्वेष करतो, तो पढतमूर्ख होय. (३८)

त्यागावया अवगुण । बोलिलें पढतमूर्खाचें लक्षण ।
विचक्षणें नी‍उन पूर्ण । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ३९ ॥

लोकांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून पढतमूर्खाची लक्षणे वर्णन केली आहेत. विचारवंतांनी त्यातील न्यून असेल ते पूर्ण करून घ्यावे व मला क्षमा करावी. (३९)

परम मूर्खामाजी मूर्ख । जो संसारीं मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख । आणीक नाहीं ॥ ४० ॥

या संसारात जो सुख मानतो तो परम मूर्खामध्येही मूर्ख असतो. या संसारदुखाएवढे दुःख आणखी कुठलेही नाही. (४०)

तेंचि पुढें निरूपण । जन्मदुःखाचें लक्षण ।
गर्भवास हा दारुण । पुढें निरोपिला ॥ ४१ ॥

येथून पुढे त्याचेच वर्णन केले आहे. जन्म घेतल्यावर सोसावे लागणारे दुःख व गर्भवासाचे दारुण दुःख पुढे वर्णिले आहे (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पढतमूर्खलक्षणनाम समास दहावा ॥ १० ॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘पढतमूर्खलक्षणनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त दशक दुसरा समाप्त

॥ दशक दुसरा समाप्त ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम

समास पहिला : जन्मदुःख निरूपण

॥ श्रीराम ॥

जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर ।
जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १॥

श्री समर्थ म्हणतात की, जन्म हा दुःखरूपी वृक्षाचा अंकुर म्हणजे आरंभ. जन्म झाला की दुःखाला सुरुवातच होते. जन्म शोकाचा समुद्र असून भयाचा कधीही न हलणारा असा डोंगर आहे. (१)

जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी ।
जन्म काळाची जाचणी । निच नवी ॥ २॥

जन्म म्हणजे कर्माची मूस आहे. कारण जन्मापासूनच कर्म पाठीस लागते. जन्म ही पातकाची खाण आहे. जन्म ही नित्यनूतन काळाची जाचणी आहे. कारण जन्माला आल्यापासून काळाचे भय सदा मागे लागलेलेच असते. (२)

जन्म कुविद्येचें फळ । जन्म लोभाचें कमळ ।
जन्म भ्रांतीचें पडळ । ज्ञानहीन ॥ ३॥

जन्म हे कुविद्येचे फळ आहे असे म्हणण्याचे कारण वासनेमुळेच जन्म घ्यावा लागतो. जन्मास लोभाचे कमळ म्हटले आहे. लोभ म्हणजे आसक्ती. आसक्तिरूपी कमळातच जीवरूपी भ्रमर गुंतून पडतो. जन्म हे भ्रांतीचे पडळ आहे. कारण जन्म होताच स्वस्वरूपाचे विस्मरणरूपी अज्ञान उत्पन होते. (३)

जन्म जिवासी बंधन । जन्म मृत्यासी कारण ।
जन्म हेंचि अकारण । गथागोवी ॥ ४॥

जन्म होताच मी देह हे विपरीत ज्ञान बुद्धीस व्यापते व वास्तविक मुक्त असून जीव आपल्याला बद्ध समजू लागतो. तसा देहाचा जन्म म्हणजे अकारणच मायेत गुरफटणे होय. (४)

जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर ।
जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५॥

जन्म होताच स्वस्वरूपाचा विसर पडतो. तोच सुखाचा विसर होय. मी देह ही भावना दृढ होताच एकामागोमाग एक चिंता त्या जीवास व्यापून टाकतात, म्हणून जन्म म्हणजे चिंतेचे आगर म्हटले असून जन्मच मुळी वासनेमुळे होतो आणि त्यानंतर वासनांची सतत वृद्धीच होत जाते. (५)

जन्म जीवाची आवदसा । जन्म कल्पनेचा ठसा ।
जन्म लांवेचा वळसा । ममतारूप ॥ ६॥

जन्म होताच जीवाचे स्वस्वरूपज्ञान लोपते हे एक प्रकारे त्याचे अधःपतनच असते. जन्म होताच मी देह या कल्पनेचा ठसा बुद्धीवरउमटतो आणि मग ममतारूप डाकीण त्याला झपाटून टाकते. (६)

जन्म मायेचे मैंदावें । जन्म क्रोधाचें विरावें ।
जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७॥

जन्म म्हणजे मायेचे कपट होय. जन्म म्हणजे क्रोधाचे वीरपण होय. जन्म मोक्षाच्या मार्गात आडवे येणारे विघ्नच आहे. (७)

जन्म जिवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण ।
जन्म हेंचि विस्मरण । ईश्वराचें ॥ ८॥

देहाचा जन्म होताच मी देह हा अहंकार उत्पन होतो, म्हणजे अहंता तेव्हापासून आपला प्रभाव गाजवू लागते आणि गर्भात असताना च्या जीवास ईश्वराचे स्मरण असते, त्यास जन्मताक्षणी त्याचा पूर्ण विसर पडतो. (८)

जन्म विषयांची आवडी । जन्म दुराशेची बेडी ।
जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९॥

जन्म होताच विषयांची आवड उत्पन्न होते, इंद्रियांनी विषयोपभोग घेतले असता सुख लाभेल अशी दुराशेची बेडी हातापायात पडते. काळ म्हणजे मृत्यू. काकडी खावी तसा काळ या शरीरास कधी नष्ट करील, हे सांगता येत नाही. (९)

जन्म हाचि विषमकाळ । जन्म हेंचि वोखटी वेळ ।
जन्म हा अति कुश्चीळ । नर्कपतन ॥ १०॥

जन्मकाळ हाच वाईट काळ असून ती वेळ फार कठीण, प्राणसंकटाची असते. जन्म फार घाणेरडा असून ते नरकात पडणेच समजावे. (१०)

पाहातां शरीराचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ ।
रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥ ११॥

या देहाची उत्पत्ती कशी होते, याचा विचार करू लागल्यास या देहासारखे अमंगळ काही नाही अशी खात्री पटते. रजस्वलेच्या विटाळामध्ये याचा जन्म होतो. (११)

अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा ।
तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवी घडे ॥ १२॥

ज्या विटाळास अत्यंत अमंगळ, दोषास्पद मानतात, त्या विटाळाचाच पुतळा म्हणजे हा देह होय. असा मुळातच जो अमंगळ, त्याला निर्मळ करण्याचा खयटोप केला, तरी तो कसा सफल होणार ? (१२)

रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोन जाला गाळ ।
त्या गळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३॥

रजस्वलेचा विटाळ आटून त्याचा जो गाळ बनतो, त्या गाळाचेच हे शरीर बनते. (१३)

वरी वरी दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नर्काचें ।
जैसें झांकणें चर्मकुंडाचें । उघडितांच नये ॥ १४॥

ते वरवर सुरेख दिसते, पण वास्तविक ते आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे. चांभाराच्या चर्मकुंडाचे झाकण काढायची ज्याप्रमाणे सोयच नसते, तशीच या शरीराची स्थिती आहे. (१४)

कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यईं धु‍ईजेतें ।
तरी दुर्गंधी देहातें । शुद्धता न ये ॥ १५॥

ते चर्मकुंड धुऊन काढले असता स्वच्छ होऊ शकते पण या देहाला दररोज कितीही धुऊन काढले तरी दुर्गंधीने भरलेला हा देह निर्मळ होतच नाही. (१५)

अस्तीपंजर उभविला । सीरानाडीं गुंडाळिला ।
मेदमांसें सरसाविला । सांदोसाअंदीं भरूनी ॥ १६॥

हाडांचा सापळा उभा केला, तो शिरा नाड्या यांनी गुंडाळला आणि प्रत्येक सांध्यामध्ये चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगवला. असा हा देह तयार होतो. (१६)

अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंहि भरलें असे देहीं ।
नाना व्याधी दुःखें तेंहि । अभ्यांतरी वसती ॥ १७॥

रक्त म्हणजे ‘अशुद्ध’ अर्थात जे शुद्ध नाही, तेही या शरीरात भरलेले असते. शिवाय या शरीरात नाना व्याधी दुःखे भरलेली असतात. (१७)

नर्काचें कोठार भरलें । आंतबाहेरी लिडीबिडिलें ।
मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधीचें ॥ १८॥

शरीर म्हणजे आतबाहेर घाणीने लडबडलेले व नर्काचे कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवीच आहे. (१८)

जंत किडे आणी आंतडी । नाना दुर्गंधीची पोतडी ।
अमुप लवथविती कातडी । कांटाळवाणी ॥ १९॥

शरीरात जैत, किडे वळवळत असतात आणि नाना प्रकारच्या दुर्गंधीची पोतडी म्हणजे यातील आतडी होत. शरीरात अनेक कंटाळवाणी गलिच्छ कातडी लोंबत असतात. (१९)

सर्वांगास सिर प्रमाण । तेथें बळसें वाहे घ्राण ।
उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधी नेघवे ॥ २०॥

शरीरात शिर म्हणजे मस्तक हे श्रेष्ठ म्हणतात. त्याला उत्तमांग म्हणतात, पण तेथे नाकांतून शेंबूड वाहात असतो आणि कान फुटला असता जी दुर्गंधी त्या घाणीमुळे सुटते ती तर सहनच होत नाही. (२०)

डोळां निघती चिपडें । नाकीं दाटतीं मेकडें ।
प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥२१॥

डोळ्यांत चिपडे येतात, नाकांत मेकडे गर्दी करतात, सेज प्रातःकाळी तोंडातून मळासारखी घाण बाहेर पडते. (२१)

लाळ थुंका आणी मळ । पीत श्लेष्मा प्रबळ ।
तयास म्हणती मुखकमळ । चंद्रासारिखें ॥ २२॥

ज्या तोंडामध्ये लाळ, थुंकी आणि इतर घाण, तसेच पित्त, कफ यासारखी प्रबळ घाण भरलेली असते, त्याला मुखकमळ चंद्रासारखे आहे, असे म्हणतात. (२२)

मुख ऐसें कुश्चीळ दिसे । पोटीं विष्ठा भरली असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । भूमंडळीं ॥ २३॥

तोंड असे घाणेरडे असते, तर पोटात विष्ठा भरलेली असते. या गोष्टी जगात प्रत्यक्षच आहेत. त्यांना दुसरे प्रमाण देण्याची जरुरी नाही. (२३)

पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्ठा कांहीं वमन ।
भागीरथीचें घेतां जीवन । त्याची कोये लघुशंका ॥ २४॥

पोटात जरी काही मिष्टान्न, दिव्यान्न घातले तरी त्यातील काहीची विष्ठा होते, तर कधी कधी काही ओकूनही पडते. जरी अगदी गंगाजलप्राशन केले तरी त्याचे मूत्रच बनते. (२४)

एवं मळ मूत्र आणी वमन । हेंचि देहाचें जीवन ।
येणेंचि देह वाढे जाण । यदर्थीं संशय नाहीं ॥ २५॥

थोडक्यात, मल मूत्र आणि ओक हे देहाचे जीवन असून त्यांनीच देहाचे पोषण होते, याबद्दल संशय नाही. (२५)

पोटीं नस्तां मळ मूत्र वोक । मरोन जाती सकळ लोक ।
जाला राव अथवा रंक । पोटीं विष्ठा चुकेना ॥ २६॥

जर पोटात याप्रमाणे मल, मूत्र, ओक नसतील, तर सर्व लोक मरून जातील. राव असो वा रंक असो, त्याच्या पोटात विष्ठा असतेच असते. ती चुकत नाही. (२६)

निर्मळपणें काढूं जातां । तरी देह पडेल तत्वतां ।
एवं देहाची वेवस्था । ऐसी असे ॥ २७॥

स्वच्छ करण्यासाठी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर देह मरून जाईल या देहाची अवस्था ही अशी असते. (२७)

ऐसा हा धड असतां । येथाभूत पाहों जातां ।
मग ते दुर्दशा सांगतां । शंका बाधी ॥ २८॥

जो पर्यंत देह धडधाकट असतो तोपर्यंत देहाची कशी अवस्था असते, हे इत्यंभूत सांगितले तरी खरे वाटत नाही व देह खरेच असा घाणेरडा आहे का, अशी शंका मनात येते. (२८)

ऐसिये कारागृहीं वस्ती । नवमास बहु विपत्ती ।
नवहि द्वारें निरोधती । वायो कैंचा तेथें ॥ २९॥

अशा या देहरूपी कारागृहात वस्तीला आल्यामुळे जीवाला नऊ महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयात वायू नसतो. त्यामुळे देहातील नऊ द्वारे (दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन भोके, तोंड गुद आणि उपस्थ) रोधली जातात. (२९)

वोका नरकाचे रस झिरपती । ते जठराग्नीस्तव तापती ।
तेणें सर्वहि उकडती । अस्तिमांस ॥ ३०॥

आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यातून पाणी झिरपते, रस झिरपतात, ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे गर्भाच्या अस्थी व मांस उकडून निघतात. (३०)

त्वचेविण गर्भ खोळे । तंव मातेसी होती डोहळे ।
कटवतिक्षणें सर्वांग पोळे । तया बाळकाचें ॥ ३१॥

गर्भाला त्वचा नसते, तो नुसता मांसपिंड खोळीत असतो. तो हालचाल करू लागतो, तेव्हा मातेला डोहाळे लागतात. ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते, त्यामुळे त्या गर्भातील बालकाचे सर्वांग होरपळते. (३१)

बांधलें चर्माचें मोटाळें । तेथें विष्ठेचें पेटाळें ।
रसौपाय वंकनाळें । होत असे ॥ ३२॥

गर्भ म्हणजे चामड्याचे बांधलेले गाठोडे व आत विष्ठेचे पोतडे असते. नाभीपासून निघणाऱ्या नाळेच्याद्वारे जगण्यास आवश्यक असणारे रस त्याला मिळतात. (३२)

विष्ठा मूत्र वांती पीत । नाकीं तोंडीं निघती जंत ।
तेणें निर्बुजलें चित्त । आतिशयेंसीं ॥ ३३॥

मल मूत्र, ओक आणि पित्त यांच्यामुळे नाकातोंडातून जंतू बाहेर पडतात. त्यामुळे त्या गर्भातील जीव अतिशय घाबरतो. (३३)

ऐसिये कारागृहीं प्राणी । पडिला अत्यंत दाटणीं ।
कळवळोन म्हणे चक्रपाणी । सोडवीं येथून आतां ॥ ३४॥

अशा या कैदखान्यात तो जीव अत्यंत अडचणीत सापडतो. त्यावेळी तो जीव कळवळून म्हणू लागतो की, ‘हे चक्रपाणी, मला आता येथून सोडव.’ (३४)

देवा सोडविसी येथून । तरी मी स्वहित करीन ।
गर्भवास हा चुकवीन । पुन्हां न ये येथें ॥ ३५॥

हे देवा, जर तू आत्ता मला येथून सोडवशील, तर मी स्वतःचे हित करून घेईन आणि गर्भवास चुकवीन. पुन्हा येथे येणार नाही. (३५)

ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली । तंव जन्मवेळ पुढें आली ।
माता आक्रंदों लागली । प्रसूतकाळीं ॥ ३६॥

दुःखाने कासावीस होऊन जीव अशी प्रतिज्ञा करतो, तोच जन्मवेळ जवळ आलेली असते आणि प्रसूतीची वेळ आल्याने त्या वेदनांनी आई आरडाओरडा करू लागते. (३६)

नाकीं तोंडीं बैसलें मांस । मस्तकद्वारें सांडी स्वास ।
तेंहि बुजलें निशेष । जन्मकाळीं ॥ ३७॥

पोराच्या नाकातोंडात मांस घट्ट बसल्याने ते मस्तकावरील टाळूच्या छिद्राद्वारे श्वासोच्छवास करू लागते. पण ते छिद्रही जन्मकाळी बुजून जाते. (३७)

मस्तकद्वार तें बुजलें । तेणें चित्त निर्बुजलें ।
प्राणी तळमळूं लागलें । चहूंकडे ॥ ३८॥

टळूचे छिद्र बंद झाल्याने त्या पोराचा जीव घाबरा होऊन तो तळमळून चहूकडे हळू लागतो. (३८)

स्वास उस्वास कोंडला । तेणें प्राणी जाजावला ।
मार्ग दिसेनासा जाला । कासावीस ॥ ३९॥

श्वासोच्छवास कोंडला गेल्यामुळे तो जीव त्रासतो, पण मार्गच नसल्यामुळे तो कासावीस होतो. (३९)

चित्त बहु निर्बुजलें । तेणें आडभरीं भरलें ।
लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ ४०॥

अतिशय घाबरून मूल बाहेर येण्यासाठी धडपडू लागले, पण ते भलत्याच जागी अडकून आडवे झाले. तेव्हा लोक म्हणू लागले की, ‘ अरे मूल आडवे आले आहे, तर आता त्याला कापून त्याचे तुकडे करूनच काढा.’ (४०)

मग ते खांडून काढिती । हस्तपाद छेदून घेती ।
हातां पडिलें तेंचि कापिती । मुख नासिक उदर ॥ ४१॥

मग त्या मुलाचे हात, पाय, किंवा तोंड नाक पोट वगैरे जे अवयव हाताला सापडतील, ते कापून काढले जातात. (४१)

ऐसे टवके तोडिले । बाळकें प्राण सोडिले ।
मातेनेंहि सांडिलें । कळिवर ॥ ४२॥

अशा प्रकारे त्या बालकाचे टवके तोडून काढताक्षणी ते बालक प्राण सोडते. एवढेच नव्हे तर या सगळ्या खटपटीत माताही देहाचा त्याग करते. (४२)

मृत्य पावला आपण । मतेचा घेतला प्राण ।
दुःख भोगिलें दारुण । गर्भवासीं ॥ ४३॥

याप्रमाणे ते बालक स्वत: मृत्यू पावते व आईचाही प्राण जातो. गर्भवासात त्या जीवाला भयंकर दुःख भोगावे लागते. (४३)

तथापी सुकृतेंकरूनी । मार्ग सांपडला योनी ।
तर्ह्हीं आडकला जाउनी । कंठस्कंदीं मागुता ॥ ४४॥

तथापि जर पूर्वपुण्याईच्या योगे त्याला योनीतून बाहेर येण्याचा सरळ मार्ग सापडला, तरी त्याची मान, खांदा वगैरे एखादा अवयव त्या संकुचित मार्गात अडकून बसतो. (अ)

तये संकोचित पंथीं । बळेंचि वोढून काढिती ।
तेणें गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५॥

मग त्या संकुचित मार्गातून त्याला बळेच ओढून बाहेर काढतात. त्यायोगेही त्या बालकाचे प्राण कधी कधी जातात. (४५)

बाळकाचे जातां प्राण । अंतीं होये विस्मरण ।
तेणें पूर्वील स्मरण । विसरोन गेला ॥ ४६॥

बालकाचे प्राण जाऊ लागले की, त्या अंतसमयी परमेश्वराचे विस्मरण होऊन पूर्वीच्या सर्व गोष्टी तो विसरून जातो. (४६)

गर्भीं म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं ।
ऐसा कष्टी जाला बहु । गर्भवासीं ॥ ४७॥

गर्भात असताना स्वस्वरूपाचे ज्ञान असल्याने तो जीव ‘ सोहं सोहं ‘ म्हणजे मी तोच आहे, म्हणजे मी ब्रह्मच आहे, असे म्हणत असतो, पण बाहेर पडला की ‘कोहं’ म्हणजे मी कोण आहे असे म्हणू लागतो. अर्थात त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण होते. (४७)

दुःखा वरपडा होता जाला । थोरा कष्टीं बाहेरी आला ।
सवेंच कष्ट विसरला । गर्भवासाचे ॥ ४८॥

गर्भात असताना दुःखी असलेला तो जीव तेथून मोठ्या कष्टाने बाहेर येतो. पण बाहेर येताच गर्भवासातील सर्व कष्ट तो पार विसरून जातो. (४८)

सुंन्याकार जाली वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं ।
अज्ञानें पडिली भ्रांती । तेणें सुखचि मानिलें ॥ ४९॥

त्याची वृत्ती शून्याकार होऊन त्याला चित्तात काहीच आठवेनासे होते आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन जन्मलेल्या बालकाला सुखच वाटू लागते. (४९)

देह विकार पावलें । सुखदुःखें झळंबळे ।
असो ऐसें गुंडाळलें । मायाजाळीं ॥ ५०॥

त्याचा देह विकार पावू लागतो. त्याची वाढ होऊ लागली की, तो जीव सुख-दुःखाने व्याप्त होतो. असो. यप्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यात सापडून बद्ध होतो. (५०)

ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणीमात्रांसीं ।
म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१॥

प्रत्येक प्राणिमात्राला गर्भवासात असे दारुण दुःख भोगावे लागते. म्हणून त्याने भगवंतास शरण जावे. (५१)

जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त ।
ज्ञानबळें बिरक्त । सर्वकाळ ॥ ५२॥

जो भगवंताचा भक्त असतो, तो या जन्ममरणाच्या चक्रातून आपल्या विरक्तीच्या आणि ज्ञानाच्या बळावर कायमचा मुक्त होतो. त्याला पुनर्जन्म नसतो. (५२)

ऐशा गर्भवासीं विपत्ती । निरोपिल्या येथामती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ५३॥

श्रीसमर्थ म्हणतात की, याप्रमाणे गर्भवासातील दुःखाचे मी यथामती वर्णन येथे केले आहे. आता पुढे जे काही सांगणार आहे, त्याकडे श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे. (५३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
जन्मदुःखनिरूपणनाम समास पहिला ॥ १॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘जन्मदुःखनिरूपणनाम’ समास पहिला समाप्त.

समास दुसरा : स्वगुणपरीक्षा (अ)

॥ श्रीराम ॥

संसार हाचि दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
मागां बोलिली तळमळ । गर्भवासाची ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, हा संसारच मुळी दुःखाचे मूळ आहे. यात दुःखाची इंगळी लागते, तेव्हा तिच्या डंखाने प्राणांतिक वेदना होतात. मागील समासात गर्भवासात ज्या यातना सोसाव्या लागतात, त्याचे वर्णन केले होते. (१)

गर्भवासीं दुःख जालें । तें बाळक विसरलें ।
पुढें वाढों लागलें । दिवसेंदिवस ॥ २॥

पण गर्भवासात जे दुःख भोगलेले असते त्याचा त्या बालकास विसर पडतो आणि पुढे ते दिवसेंदिवस वाढू लागते. (२)

बाळपणीं त्वचा कोंवळी । दुःख होतांचि तळमळी ।
वाचा नाहीं तये काळीं । सुखदुःख सांगावया ॥ ३॥

बाळपणी त्याची त्वचा फार कोवळी असते. त्यामुळे जरा काही दुःख झाले की ते तळमळू लागते आणि सुखदुःख सांगावे म्हटले तर त्यावेळी त्याला बोलताही येत नसते. (३)

देहास कांहीं दुःख जालें । अथवा क्षुधेनें पीडलें ।
तरी तें परम आक्रंदलें । परी अंतर नेणवे ॥ ४॥

देहाला काही दुःख झाले अथवा भुकेने व्याकूळ झाले, तरी ते बालक मोठमोठ्याने रडू लागते, पण आपली आतली व्यथा त्याला सांगता येत नाही. (४)

माता कुरवाळी वरी । परी जे पीडा जाली अंतरीं ।
ते मायेसी न कळे अभ्यांतरीं । दुःख होये बाळकासीं ॥ ५॥

माता त्याला जवळ घेते, कुरवाळते, पण त्याच्या अंतरांत काय दुःख आहे, ते तीही जाणू शकत नाही. त्यामुळे त्या बालकाचे दुःख दूर होऊ शकत नाही. (५)

मागुतें मागुतें फुंजे रडे । माता बुझावी घे‍ऊन कडे ।
वेथा नेणती बापुडें । तळमळी जीवीं ॥ ६॥

ते मूल हुंदके देऊन परत परत रडते, आई त्याला कडेवर घेऊन समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्याला काय व्यथा आहे हे कुणीच जाणू शकत नाही; त्यामुळे ते मूल बिचारे तळमळत राहाते. (६)

नानाव्याधीचे उमाळे । तेणें दुःखें आंदोळे ।
रडे पडे कां पोळे । अग्निसंगें ॥ ७॥

नाना व्याधींच्या जोरामुळे ते दुःखाने भयकंपित होते. कधी ते रडते, कधी पडते, तर कधी विस्तवामुळे ते पोळतेही. (७)

शरीर रक्षितां नये । घडती नाना अपाये ।
खोडी अधांतरीं होये । आवेवहीन बाळक ॥ ८॥

त्याला स्वतःच्या शरीराचे रक्षण करता येत नाही. त्यामुळे नाना अपाय घडत असतात. खोड्या करताना अकस्मात अपाय होऊन त्याला एखादा अवयवही गमवावा लागतो. (८)

अथवा अपाय चुकले । पूर्णपुण्य पुढें ठाकलें ।
मातेस ओळखों लागलें । दिवसेंदिवस ॥ ९॥

अथवा पूर्णपुण्याईमुळे असे काही अपाय झाले नाहीत की ते मोठे होऊन हळूहळू आपल्या आईला अधिकाधिक ओळखू लागते. (९)

क्षणभरी मातेस न देखे । तरी आक्रंदें रुदन करी दुःखें ।
ते समईं मातेसारिखें । आणीक कांहिंच नाहीं ॥ १०॥

मग एक क्षणभर जरी आई दिसली नाही, तरी ते दुःखाने मोठमोठ्याने रडू लागते. त्यावेळी त्याला आईसारखे दुसरे आणखी काहीच आवडत नाही. (१०)

आस करून वास पाहे । मातेविण कदा न राहे ।
वियोग पळमात्र न साहे । स्मरण जालियां नंतरें ॥ ११॥

मोठ्या आशेने ते आईची वाट पाहात असते, आईशिवाय ते जराही राहत नाही. आईची आठवण झाली की, तिचा वियोग त्याला पळभरही सहन होत नाही. (११)

जरी ब्रह्मादिक देव आले । अथवा लक्ष्मीने अवलोकिलें ।
तरी न वचे बुझाविलें । आपले मातेवांचुनी ॥ १२॥

ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले, कितीही समजाविण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या आईला सोडून ते थोडा वेळही राहात नाही. (१२)

कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण ।
तरी नाहीं तीसमान । भूमंडळीं कोणी ॥ १३॥

आई कुरूप असो कुलक्षणी असो अथवा सगळ्यांच्यापेक्षा अभागी असो, त्या बाळाला सर्व जगात तिच्यासारखे कोणीही नसते. (१३)

ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसे उणें ।
रागें परतें केलें तिनें । तरी आक्रंदोनी मिठी घाली ॥ १४॥

आई नसेल तर ते मूल केविलवाणे, दीन दिसते. तिने रागावून त्याला दूर सारले तरी ते मोठमोठ्याने रडू लागते व धावत येऊन तिलाच मिठी मारते. (१४)

सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी ।
अतिप्रीति तयेकाळीं । मातेवरी लागली ॥ १५॥

आईच्या जवळ ते आनंदात असते. तिने दूर सारले तर ते तळमळू लागते. त्यावेळी आईवर त्याचे अतिशय प्रेम जडलेले असते. (१५)

तंव ते मातेस मरण आलें । प्राणी पोरटें जालें ।
दुःखें झुर्णीं लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६॥

अशा स्थितीत आई मरण पावली तर ते मूल अगदी पोरके होते आणि ‘आई, आई’ म्हणून दुःखाने झुरणीला लागते. (१६)

आई पाहातां दिसेना । दीनरूप पाहे जना ।
आस लागलिसे मना । आई ये‍ईल म्हणोनी ॥ १७॥

आई कुठे दिसत नाही. त्यामुळे ते केविलवाणे होऊन लोकांच्या तोंडाकडे पाहू लागते. त्याला अजून आशा वाटत असते की आपली आई जरूर परत येईल. (१७)

माता म्हणौन मुख पाहे । तंव ते आपुली माता नव्हे ।
मग हिंवासलें राहे । दैन्यवाणें ॥ १८॥

एखाद्या स्त्रीला पाहून ही आपली आई तर नाही ना, या विचाराने ते तिच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहू लागते, तेव्हा त्याला कळते की, ही आपली आई नाही. त्यामुळे ते मूल हिरमुसले होते आणि केविलवाणे दिसू लागते. (१८)

मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख जालें ।
देहहि क्षीणत्व पावलें । आतिशयेंसीं ॥ १९॥

आईच्या वियोगाने ते फार कष्टी होते. त्याला मनात अत्यंत दुःख वाटते. त्यामुळे त्याचे शरीरही अत्यंत रोडावते. (१९)

अथवा माताहि वांचली । मायलेंकुरा भेटी जाली ।
बाळदशा ते राहिली । देवसेंदिवस ॥ २०॥

मातेलाही मरण न येता ती वाचली, तरमायलेकरची भेट होते. मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही संपत येते. (२०)

बाळपण जालें उणें । दिवसेंदिवस होये शाहाणें ।
मग ते मायेचें अत्यंत पेरूणें । होतें, तें राहिलें ॥ २१॥

बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस शहाणे होऊ लागते. मग त्याला जो आईचा अत्यंत लळा लागलेला असतो, तो तितका राहात नाही. (२१)

पुढें लो लागला खेळाचा । कळप मेळविला पोरांचा ।
आल्यगेल्या डायाचा । आनंद शोक वाहे ॥ २२॥

पुढे त्याला खेळाचा नाद लागतो आणि तो मुलांचा मेळा जमवून खेळण्यात दंग होतो. डाव जिंकला तर त्याला आनंद होतो आणि डाव हरला तर दुःख वाटते. (२२)

मायेबापें सिकविती पोटें । तयाचें परम दुःख वाटे ।
चट लागली न सुटे । संगती लेंकुरांची ॥ २३॥

आईवडील अत्यंत ममतेने मनःपूर्वक त्याला शिकविण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला त्यामुळे फार दुःख होते. मुलांच्या संगतीची चटक लागलेली असते, ती सुटता सुटत नाही. (२३)

लेंकुराअंमध्यें खेळतां । नाठवे माता पिता ।
तंव तेंथेहि अवचिताअ । दुःख पावला ॥ २४॥

मुलांमध्ये खेळत असताना त्याला आईवडिलांची आठवणही होत नाही, परंतु त्या खेळण्यात अकस्मात दुःख ओढवते. (२४)

पडिले दांत फुटला डोळा । मोडले पाय जाला खुळा ।
गेला माज अवकळा- । ठाकून आली ॥ २५॥

खेळ्याना दात पडतात, डोळा फुटतो किंवा पाय मोडून तो लंगडा होतो, अगदी वेड्यासारखी त्याची अवस्था होते. त्याची सर्व मस्ती उतरते, जिरते व व्यंग आल्याने अवकळा येते. (२५)

निघाल्या देवी आणी गोवर । उठलें कपाळ लागला ज्वर ।
पोटसुळीं निरंतर । वायगोळा ॥ २६॥

त्यात त्याला देवी येतात किंवा गोवर येतो, कपाळ दुखू लागते किंवा अंगात ताप भरतो, नाही तर निरंतर वायगोळा उठून पोटशूळ लागतो. (२६)

लागलीं भूतें जाली झडपणी । जळीच्या मेसको मायेराणी ।
मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची ॥ २७॥

त्याची अवस्था पाहून लोक नाना तर्ककुतर्क करू लागतात. कुणी म्हणते की, याला भुतांनी (झपाटले) आहे, तर कुणी म्हणतात की, याला मेसको, मायेराणी या जलदेवतांनी पकडले आहे. कुणी म्हणतात की मुंज्या, झोटिंग किंवा म्हसोबाची करणी बाधली आहे. (२७)

वेताळ खंकाळ लागला । ब्रह्मगिर्ह्हो संचरला ।
नेणों चेडा वोलांडिला । कांहीं कळेना ॥ २८॥

कुणी म्हणतो की, याला दुष्ट वेताळ लागला आहे, तर कुणी म्हणते की, ब्रह्मराक्षसांनी याला धरले आहे, तर कुणी म्हणते की, कुणीतरी चेटूक केले असावे किंवा याने उतारा ओलांडला असावा. खरे काय झाले आहे, ते कळतच नाही. (२८)

येक म्हणती बीरे देव । येक म्हणती खंडेराव ।
येक म्हणती सकळ वाव । हा ब्राह्मणसमंध ॥ २९॥

कोणी म्हणतो बिरदेव लागला, तर कुणी म्हणतो खंडेराव लागला, तर दुसरा कोणी म्हणतो की हे सगळेच खोटे आहे. याला ब्रह्मसमंधच लागला आहे. (२९)

येक म्हणती कोणें केलें । आंगीं देवत घातले ।
येक म्हणती चुकलें । सटवाईचें ॥ ३०॥

एक म्हणतो की, कुणी करणी केली आहे, तर कुणी म्हणतो की, मंत्र म्हणून एखादी देवता याच्या अंगात सोडली आहे, तर कोणी म्हणतो की सटवाईचे काही देणे चुकले असावे. (३०)

येक म्हणती कर्मभोग । आंगीं जडले नाना रोग ।
वैद्य पंचाक्षरी चांग । बोलाऊन आणिले ॥ ३१॥

कुणी म्हणतात की, पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ म्हणून याच्या अंगी नाना रोग जडले आहेत. असे म्हणून कुणी चांगले वैद्य किंवा चांगले मांत्रिक यांना बोलावून आणते. (३१)

येक म्हणती हा वांचेना । येक म्हणती हा मरेना ।
भोग भोगितो यातना । पापास्तव ॥ ३२॥

कोणी म्हणतात की, आता काही हा वाचत नाही. तर दुसरे कुणी म्हणतात की हा मरत नाही. पूर्वजन्मीच्या पापांचे फळ म्हणून याला या यातना भोगाव्या लागत आहेत. (३२)

गर्भदुःख विसरला । तो त्रिविधतापें पोळला ।
प्राणी बहुत कष्टी जाला । संसारदुःखें ॥ ३३॥

माणूस गर्भवासाचे दुःख जरी विसरला तरी तो त्रिविध तापाने पोळून निघतो. या नाना प्रकारच्या संसारदुःखाने तो अत्यंत कष्टी होतो. (३३)

इतुकेंहि चुकोन वांचला । तरी मारमारूं शाहाणा केला ।
लोकिकीं नेटका जाला । नांव राखे ऐसा ॥ ३४॥

या इतक्या सगळ्या कटकटीतून माणूस जर वाचला तर त्याला विद्या यावी, म्हणून आईवडील मारमारून शहाणा करतात. लोकांत नाव राखील असा तो चांगला होतो. (३४)

पुढें मायबापीं लोभास्तव । संभ्रमें मांडिला विव्हाव ।
दाऊनियां सकळ वैभव । नोवरी पाहिली ॥ ३५॥

नंतर आईवडिलांनी संसाराच्या लोभाने त्याच्या विवाहाचा विचार केला आणि आपल्या सर्व वैभवाचे प्रदर्शन करून त्याच्यासाठी नवरी पाहिली. (३५)

वर्ह्हाडीवैभव दाटलें । देखोन परमसुख वाटले ।
मन हें रंगोन गेलें । सासुरवाडीकडे ॥ ३६॥

आपापले वैभव घेऊन सर्व वार्‍हाड्यांनी दाटी केली. ते पाहून त्या नवरदेवास फार सुख वाटले व त्याचे मन सासुरवाडीकडे अगदी रंगून गेले. (३६)

मायबापीं भलतैसें असावें । परी सासुरवाडीस नेटकें जावें ।
द्रव्य नसेल तरी घ्यावें । रुण कळांतरें ॥ ३७॥

आपले आईवडील कशाही हीनदीन अवस्थेत असले, तरी सासुरवाडीस आपण नीटनेटके गेले पाहिजे. त्यासाठी द्रव्य नसले तरी ऋण काढून व्याजाने द्रव्य घेऊन तो थाटात सासुरवाडीस जातो. (३७)

आंतर्भाव ते सासुरवाडीं । मायेबापें राहिलीं बापुडीं ।
होताती सर्वस्वें कुडकुडीं । तितुकेंच कार्य त्यांचें ॥ ३८॥

त्याचे अंतःकरण आतून सर्व सासुरवाडीकडे गुंतलेले असते. आईबाप बिचारे दीन होऊन घरात राहातात. ते सर्वस्वी असहाय्य झालेले असतात. जणू तेवढ्यासाठीच जिवंत होते आणि त्यांचे कार्य आता झाले आहे. (३८)

नोवरी आलियां घरा । अती हव्यास वाटे वरा ।
म्हणे मजसारिखा दुसरा । कोणीच नाहीं ॥ ३९॥

नवरी घरी आली की, त्या नवरदेवाला तिच्याविषयी अत्यंत आसक्ती वाटू लागते व आपल्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही, असे त्याला वाटू लागते. (३९)

मायबाप बंधु बहिणी । नोवरी न दिसतां वाटे काणी ।
अत्यंत लोधला पापिणीं । अविद्येनें भुलविला ॥ ४०॥

घरात आई-वडील, भाऊ-बहिणी सर्व असली तरी नवरी दिसली नाही तर बाकीची सर्व त्याला तुच्छ वाटू लागतात. आपल्या बायकोमध्ये तो अधिकच गुंतून जातो. पापी अविद्येने त्याला पार भुलवून ठाकले असते. (४०)

संभोग नस्तां इतुका प्रेमा । योग्य जालिया उलंघी सीमा ।
प्रीती वाढविती कामा- । करितां प्राणी गुंतला ॥ ४१॥

स्त्री वयात आली नसताही त्यास तिच्याविषयी इतके प्रेम वाटते. मग ती वयात येऊन तिच्यापासून स्त्रीसौख्य मिळू लागले म्हणजे तर त्याच्या वागण्याला मर्यादाच राहात नाही. त्यांचे एकमेकांवरील प्रेम वाढू लागते आणि कामवासनेमुळे माणूस पुरता प्रपंचात गुरफटून जातो. (४१)

जरी न देखे क्षण येक डोळां । तरी जीव होय उताविळा ।
प्रीतीपात्र अंतर्कळा । घे‍ऊन गेली ॥ ४२॥

बायको क्षणभर जरी दृष्टीआड झाली, तरी तो तिला पाहावयास अत्यंत उतावळा होतो. त्याची प्रीतिपात्र बनलेली ती पत्‍नी त्याचे अंतःकरणच जणू घेऊन जाते. (४२)

कोवळे कोवळे शब्द मंजुळ । मर्यादा लज्या मुखकमळ ।
वक्त्रलोकनें केवळ । ग्रामज्याचे मैंदावें ॥ ४३॥

तिचे ते कोमल, मंजुळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमलासारखा सुंदर चेहरा पाहिला तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते. (४३)

कळवळा येतां सांवरेना । शरीर विकळ आवरेना ।
अनेत्र वेवसाईं क्रमेना । हुरहुर वाटे ॥ ४४॥

तिच्याबद्दलची आसक्ती अनावर होते. विषयसेवनासाठी शरीर व्याकूळ बनते, ते आवरत नाही. अन्यत्र दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही, सारखी तिची हुरहुर वाटत राहते. (४४)

वेवसाय करितां बाहेरी । मन लागलेंसे घरीं ।
क्षणाक्षणां अभ्यांतरीं । स्मरण होये कामिनीचें ॥ ४५॥

बाहेर काही व्यवसाय करीत असला तरी त्याचे मन सर्वस्वी घरी लागलेले असते. क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या कामिनीचे स्मरण त्याला होत असते. (४५)

तुम्हीं माझिया जिवांतील जीव । म्हणौनी अत्यंत लाघव ।
दाऊनियां चित्त सर्व । हिरोन घेतलें ॥ ४६॥

‘तुम्ही माझ्या जीवापेक्षाही मला प्रिय आहात’ असे त्याची स्त्री अत्यंत लाघवीपणाने म्हणते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सर्व चित्त हिरावून घेते. (४६)

मैद सो‍इरीक काढिती । फांसे घालून प्राण घेती ।
तैसें आयुष्य गेलियां अंतीं । प्राणीयांस होये ॥ ४७॥

ठग किंवा पेंढारी लोक आधी ओळख काढतात आणि नंतर रुमालाचा गळफास लावून प्राण घेतात, तशी आयुष्य संपत आल्यावर माणसाची स्थिती होते. (४७)

प्रीति कामिनीसीं लागली । जरी तयेसी कोणी रागेजली ।
तरी परम क्षिती वाटली । मानसीं गुप्तरूपें ॥ ४८॥

आपल्या स्त्रीवर त्यांचे फार प्रेम जडते. तिला जरा कुणी रागाने बोलले की, मनातल्या मनात त्याला अत्यंत दुःख होते. (४८)

तये भार्येचेनि कैवारें । मायेबापासीं नीच उत्तरें ।
बोलोनियां तिरस्कारें । वेगळा निघे । ४९॥

आपल्या बायकोचा कैवार घेऊन तो आईवडिलांना शिवीगाळ करतो, वाईट शब्दांत प्रत्युत्तर देतो, तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळा निघतो. (४९)

स्त्रीकारणें लाज सांडिली । स्त्रीकारणें सखीं सोडिलीं ।
स्त्रीकारणें विघडिलीं । सकळहि जिवलगें ॥ ५०॥

स्त्रीसाठी तो लाजलज्जा सोडतो. तिच्याकरता मित्रांना सोडतो. एवढेच नव्हे तर तिच्याखातर सर्व जिवलगांशी असलेले चांगले संबंध तो बिघडवून टकतो. (५०)

स्त्रीकारणें देह विकिला । स्त्रीकारणें सेवक जाला ।
स्त्रीकारणें सांडविला । विवेकासी ॥ ५१॥

स्त्रीकरिता जणू तो आपला देहही विकतो. तिचा सेवक होऊन राहतो. स्त्रीकरिता तो विवेकालाही मुकतो. (५१)

स्त्रीकारणें लोलंगता । स्त्रीकारणें अतिनम्रता ।
स्त्रीकारणें पराधेनता । अंगिकारिली ॥ ५२॥

स्त्रीसाठी तो लंपट बनतो. तिच्यासाठीच अति नम्रता धारण करतो आणि पराधीन होऊन राहतो. (५२)

स्त्रीकारणें लोभी जाला । स्त्रीकारणें धर्म सांडिला ।
स्त्रीकारणें अंतरला । तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३॥

स्त्रीच्या योगे तो लोभी होतो, धर्माचा त्याग करतो. तीर्थयात्रा, स्वधर्म इत्यादी गोष्टी तो करू शकत नाही. (५३)

स्त्रीकारणें सर्वथा कांहीं । शुभाशुभ विचारिलें नाहीं ।
तनु मनु धनु सर्वही । अनन्यभावें अर्पिलें ॥ ५४॥

स्त्रीच्या आसक्तीमुळे तो शुभ- अशुभ याचा विचारही करीत नाही. आपले तन, मन, धन किंबहुना सर्वस्वच अनन्यभावाने तिला अर्पण करतो. (५४)

स्त्रीकारणें परमार्थ बुडविला । प्राणी स्वहितास नाडला ।
ईश्वरीं कानकोंडा जाला । स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५॥

स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला, स्वहितास मुकला, ईश्वराविषयी उदासीन झाला आणि कामासक्ती मात्र वाढली. (५५)

स्त्रीकारणें सोडिली भक्ती । स्त्रीकारणें सोडिली विरक्ती ।
स्त्रीकारणें सायोज्यमुक्ती । तेहि तुछ्य मानिली ॥ ५६॥

स्त्रीला वश होऊन त्याने भक्तीचा त्याग केला, विरक्ती सोडून दिली. एवढेच नव्हे तर जी स्वीकारण्यास योग्य ती सायुज्य मुक्तीही त्याने तुच्छ मानली. (५६)

येके स्त्रियेचेनि गुणें । ब्रह्मांड मानिलें ठेंगणें ।
जिवलगें तीं पिसुणें । ऐसीं वाटलीं ॥ ५७॥

एका स्त्रीच्या नादाने त्याने सर्व ब्रह्मांड तुच्छ मानले. प्रेमाची माणसे त्यास शत्रूसारखी वाटू लागली. (५७)

ऐसी अंतरप्रीति जडली । सार्वस्वाची सांडी केली ।
तंव ते मरोन गेली । अकस्मात ॥ ५८॥

अशा प्रकारे आपल्या पत्‍नीवर त्याचे अत्यंत अंतःकरणपूर्वक प्रेम जडल्याने त्याने तिच्यापायी सर्वस्वाचा त्याग केला. तो अकस्मात ती बायको मरूनच गेली. (५८)

तेणें मनीं शोक वाढला । म्हणे थोर घात जाला ।
आतां कैंचा बुडाला । संसार माझा ॥ ५९॥

तिच्या मृत्यूने त्याच्या मनास अत्यंत शोक झाला. तो म्हणू लागला की, ‘माझा फार मोठा घात झाला. आता कसला संसार ! माझा संसार पार बुडाला.’ (५९)

जिवलगांचा सोडिला संग । अवचिता जाला घरभंग ।
आतां करूं मायात्याग । म्हणे दुःखें ॥ ६०॥

जिवलग माणसांशी संबंध सोडून टाकला आणि आता अवचित माझे घरच मोडले ! मग तो दुःखाने म्हणू लागला की, मी आता या मायेचा त्याग करतो. (६०)

स्त्री घे‍ऊन आडवी । ऊर बडवी पोट बडवी ।
लाज सांडून गौरवी । लोकां देखतां ॥ ६१॥

स्वीचे प्रेत मांडीवर घेऊन तो ऊर व पोट बडवून घेऊ लागला आणि लाज सोडून लोकांच्यासमोर तिची थोरवी वर्णन करू लागला. (६१)

म्हणे माझें बुडालें घर । आतां न करी हा संसार ।
दुःखें आक्रंदला थोर । घोर घोषें ॥ ६२॥

तो मोठमोठ्याने दुःखाने आक्रंदू लागला आणि म्हणू लागला की, ‘माझे घर बुडाले । आता मी यापुढे संसार करणार नाही !’ (६२)

तेणें जीव वारयावेघला । सर्वस्वाचा उबग आला ।
तेणें दुःखें जाला । जोगी कां महात्मा ॥ ६३॥

भ्रमिष्ट झालेल्या माणसासारखी त्याची स्थिती झाली. त्याला सर्वस्वाचा उबग आला. त्या दुःखामुळे तो अंगाला राख फासून साधू-बैसगी बनला. (६३)

कां तें निघोन जाणें चुकलें । पुन्हां मागुतें लग्न केलें ।
तेणें अत्यंतचि मग्न जालें । मन द्वितीय संमंधीं ॥ ६४॥

पण काही कारणाने घरातून निघून जाणे जमले नाही आणि शेवटी त्याने पुन्हा लग्न केले. त्यानंतर त्या दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अत्यंत आसक्त झाले. (६४)

जाला द्वितीय संमंध । सवेंचि मांडिला आनंद ।
श्रोतीं व्हावें सावध । पुढिले समासीं ॥ ६५॥

दुसरे लग्न झाल्यावर लगेच त्याच्या आनंदाला भरती आली. श्रीसमर्थ म्हणतात की, आता पुढला समास ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे. (६५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास दुसरा ॥ २॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘स्वगुणपरीक्षा (अ) नाम’ समास दुसरा समाप्त.

समास तिसरा : स्वगुणपरीक्षा (ब)

॥ श्रीराम ॥

द्वितीय संमंध जाला । दुःख मागील विसरला ।
सुख मानून राहिला । संसाराचें ॥ १॥

दुसरा विवाह होताच मागील दुःख तो विसरून गेला आणि संसारात सुख आहे असे मानून दिवस घालवू लागला. (१)

जाला अत्यंत कृपण । पोटें न खाय अन्न ।
रुक्याकारणें सांडी प्राण । येकसरा ॥ २॥

आता तो अत्यंत कंजूष झाला. पोटभर अन्न देखील खाईना. पै-पैशासाठी एकाएकी प्राण टाकू लागला. (२)

कदा कल्पांतीं न वेची । सांचिलेंचि पुन्हा सांची ।
अंतरीं असेल कैंची । सद्वासना ॥ ३॥

प्रलय ओढवला तरी पैसे खर्च करीनासा झाला. साठविलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतरात सद्‌वासना राहील तरी कशी ? (३)

स्वयें धर्म न करी । धर्मकर्त्यासहि वारी ।
सर्वकाळ निंदा करी । साधुजनाची ॥ ४॥

स्वत: धर्म करीना व इतर कुणी धर्म करू लागले, तर त्याचे निवारण करू लागला. साधु-सज्जनांची सर्वकाळ निंदा करू लागला. (४)

नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतित अभ्यागत ।
मुंगीमुखींचें जें सीत । तेंही वेंचून सांची ॥ ५॥

तीर्थयात्रा नाही, व्रत नाही की अतिथी अभ्यागत नाही, अशी त्याची वृत्ती झाली. मुंगीच्या तोंडातील अन्नाचा कणही तो वेचून साठवू लागला. (५)

स्वयें पुण्य करवेना । केलें तरी देखवेना ।
उपहास्य करी मना- । नये म्हणौनी ॥ ६॥

स्वतःच्या हातून पुण्य करवत नाही. दुसऱ्या कुणी केले तर ते पाहवत नाही. आपल्याला आवडत नाही म्हणून जो कुणी करीत असेल त्याचा उपहास करू लागला. (६)

देवां भक्तांस उछेदी । आंगबळें सकळांस खेदी ।
निष्ठुर शब्दें अंतर भेदी । प्राणीमात्रांचें ॥ ७॥

देवाला, भक्तांना त्रास देऊ लागला. आपल्या शक्तीच्या बळावर सगळ्यांना दुःख देऊ लागला. प्राणिमात्रास निष्ठुर शब्द बोलून त्याचे अंतःकरण दुखवू लागला. (७)

नीति सांडून मागें । अनीतीनें वर्तों लागे ।
गर्व धरून फुगे । सर्वकाळ ॥ ८॥

नीतीचा त्याग करून तो अनीतीने वागू लागला आणि सदासर्वदा अभिमान धरून ताठ्याने वागू लागला. (८)

पूर्वजांस सिंतरिलें । पक्षश्राद्धहि नाहीं केलें ।
कुळदैवत ठकिलें । कोणेपरी ॥ ९॥

तो पक्ष-श्राद्धही करीना. याप्रकारे त्याने आपल्या पूर्वजांनाही फसविले. काही तरी सबब शोधून तो कुळधर्म, कुळाचारही करीना. याप्रकारे त्याने कुळदेवतेलाही ठकविले. (९)

आक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा ।
आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ॥ १०॥

तो बहिणीलाच सवाष्ण म्हणून आमंत्रण देई आणि बायकोला बोलवायला आलेल्या मेहुण्यासच ब्राह्मण सांगून पाहुण्यांच्यावरच भागवू लागला आणि त्यामुळे इतर दोघांचा भोजनखर्च वाचवू लागला. (१०)

कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा ।
स्नानसंध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ ११॥

त्याला हरिकथा कधीच आवडत नसे. देवाची काय आवश्यकता आहे, असे त्याला वाटे उगीचच स्नानसंध्या तरी का म्हणून करावी ? असे तो म्हणू लागला. (११)

अभिळाषें सांची वित्त । स्वयें करी विस्वासघात ।
मदें मातला उन्मत्त । तारुण्यपणें ॥ १२॥

अभिलाषा धरून तो द्रव्यसंचय करू लागला. स्वत: दुसऱ्याचा विश्वासघात करू लागला आणि तारुण्याच्या मदाने माजून अत्यंत उन्मत्तपणे वागू लागला. (१२)

तारुण्य आंगीं भरलें । धारिष्ट न वचे धरिलें ।
करूं नयें तेंचि केलें । माहापाप ॥ १३॥

तारुण्याच्या जोरामुळे कामवासना उत्पन्न झाली. मनोधैर्य टिकणे अशक्य झाले आणि जे करू नये ते महापाप त्याने केले. (१३)

स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवेचि पोटीं ।
विषयलोभें सेवटीं । वोळखी सांडिली ॥ १४॥

स्त्री केली होती पण वयात आलेली नव्हती आणि याला तर धीर धरवेना. शेवटी विषयसुखाच्या लोभाने कुणाला ओळखेनासा झाला. (१४)

माये बहिण न विचारी । जाला पापी परद्वारी ।
दंड पावला राजद्वारीं । तर्ह्हीं पालटेना ॥ १५॥

आई-बहिणीप्रमाणे परस्त्रीशी वागावे, हा विचार राहिला नाही आणि परस्त्रीशी संबंध ठेवल्याने पातकी ठरला. त्यामुळे न्यायालयात त्याला शिक्षा झाली, तरी त्याचे वागणे पालटले नाही. (१५)

परस्त्री देखोनि दृष्टीं । अभिळाष उठे पोटीं ।
अकर्तव्यें हिंपुटी । पुन्हां होये ॥ १६॥

परस्त्री दृष्टीस पडताच त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होऊ लागली. पण तिची प्राप्ती होत नाही, असे पाहून तो पुन्हा कष्टी होऊ लागला. (१६)

ऐसें पाप उदंड केलें । शुभाशुभ नाहीं उरलें ।
तेणें दोषें दुःख भरलें । अकस्मात आंगीं ॥ १७॥

अशा रीतीने त्याने उदंड पाप केले. शुभाशुभाचा विचारही त्याच्या ठिकाणी राहिला नाही. त्या दोषामुळे अकस्मात त्याच्या अंगी दुःख भरले. (१७)

व्याधी भरली सर्वांगीं । प्राणी जाला क्षयरोगी ।
केले दोष आपुले भोगी । सीघ्र काळें ॥ १८॥

त्याच्या सर्व शरीरात रोग पसरला. त्याला क्षयरोग लागला. त्याने केलेल्या दोषांची फळे भोगण्याची पाळी लवकरच त्याच्यावर आली. (१८)

दुःखें सर्वांग फुटलें । नासिक अवघेंचि बैसलें ।
लक्षण जाऊन जालें । कुलक्षण ॥ १९॥

रोगाने त्याच्या सर्वांगावर फोड उठले, नाक झडून गेले आणि सर्व सौंदर्य जाऊन कुरूपता आली. (१९)

देहास क्षीणता आली । नाना वेथा उद्भवली ।
तारुण्यशक्ती राहिली । खंगला प्राणी ॥ २०॥

देह अगदी कृश झाला. नाना व्यथा उत्पन्न झाल्या आणि तारुण्यातील शक्ती सगळी नष्ट होऊन तो अगदी खंगून गेला. (२०)

सर्वांगीं लागल्या कळा । देहास आली अवकळा ।
प्राणी कांपे चळचळां । शक्ति नाहीं ॥ २१॥

त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या, देहाला अवकळा आली आणि अंगात शक्ती न राहिल्याने तो थरथर कापू लागला. (२१)

हस्तपादादिक झडले । सर्वांगीं किडे पडिले ।
देखोन थुंकों लागले । लाहानथोर ॥ २२॥

हात-पाय वगैरे रोगाने झडले, सर्वांगात किडे पडले. त्याच्याकडे पाहून सर्व लहान-थोर तिरस्काराने) थुंकू लागले. (२२)

जाली विष्टेची सारणी । भोवती उठली वर्ढाणी ।
अत्यंत खंगला प्राणी । जीव न वचे ॥ २३॥

त्यात त्याला जुलाब होऊ लागले. त्यामुळे आसपास दुर्गंधी सुटली. तो अत्यंत खंगून गेला. पण जीव जाता जाईना. (२३)

आतां मरण दे गा देवा । बहुत कष्ट जाले जीवा ।
जाला नाहीं नेणों ठेवा । पातकाचा ॥ २४॥

मग तो म्हणू लागला की, देवा, आता मला मरण दे. माझ्या जीवाला अत्यंत यातना झाल्या आहेत. अजून माझ्या पापांचा घडा भरला नाही का ? (२४)

दुःखें घळघळां रडे । जों जों पाहे आंगाकडे ।
तों तों दैन्यवाणें बापुडें । तळमळी जीवीं ॥ २५॥

तो दुःखाने घळघळा रडू लागला. जो जो स्वतःच्या अंगाकडे पाहावे, तो तो ते अधिकच दैन्यवाणे दिसू लागले. त्यामुळे तो बिचारा मनात तळमळू लागला. (२५)

ऐसे कष्ट जाले बहुत । सकळ जालें वाताहात ।
दरवडा घालून वित्त । चोरटीं नेलें ॥ २६॥

अशा प्रकारे त्याला खूप कष्ट झाले. सर्व वाताहात झाली. त्यात दरोडेखोरांनी दरोडा घालून सर्व द्रव्य चोरून नेले. (२६)

जालें आरत्र ना परत्र । प्रारब्ध ठाकलें विचित्र ।
आपला आपण मळमूत्र । सेविला दुःखें ॥ २७॥

याप्रमाणे ना धड इहलोक ना परलोक अशी विचित्र अवस्था झाली. प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला की, स्वतःचे मळमूत्रच दुःखाने त्याला सेवावे लागले. (२७)

पापसामग्री सरली । देवसेंदिवस वेथा हरली ।
वैद्यें औषधें दिधलीं । उपचार जाला ॥ २८॥

पुढे त्याच्या पापकर्माचा भोग सरला आणि दिवसेंदिवस त्याची व्यथा कमी होऊ लागली. वैद्याने औषधे दिली आणि त्याचा उपयोग झाला. (२८)

मरत मरत वांचला । यास पुन्हां जन्म जाला ।
लोक म्हणती पडिला । माणसांमध्यें ॥ २९॥

लोक म्हणू लागले की, हा मरता मरता वाचला आहे. याचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. आता हा जस माणसात आला आहे. (२९)

येरें स्त्री आणिली । बरवी घरवात मांडिली ।
अति स्वार्थबुद्धी धरिली । पुन्हां मागुती ॥ ३०॥

मग त्याने आपल्या स्त्रीला घरी आणली आणि परत घरात दिवा लागू लागला. पण परत त्याने पूर्वीप्रमाणेच अति स्वार्थबुद्धीच धरली. (३०)

कांहीं वैभव मेळविलें । पुन्हां सर्वही संचिलें ।
परंतु गृह बुडालें । संतान नाहीं ॥ ३१॥

काही वैभव मिळविले. परत सर्व साठवले. पण संतान नसल्याने घर बुडाल्यासारखेच त्याला वाटू लागले. (३१)

पुत्र संतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं ।
तें न फिटे म्हणोनी लेंकी । तरी हो आतां ॥ ३२॥

पुत्रसंतान झाले नाही, त्यामुळे तो दुःखी झाला. लोकांत ‘वांझ’ म्हणून नाव पडले. ते नाव जावे म्हणून ‘आता मुलगी तरी होऊ दे’ असे तो म्हणू लागला. (३२)

म्हणोन नाना सायास । बहुत देवास केले नवस ।
तीर्थें व्रतें उपवास । धरणें पारणें मांडिलें ॥ ३३॥

म्हणून त्याने नाना सायास केले. अनेक देवांना नवस केले. तीर्थयात्रा, व्रते, उपवास, धरणे, पारणे यांचा सपाटा लावला. (३३)

विषयसुख तें राहिले । वांजपणें दुःखी केलें ।
तंव तें कुळदैवत पावलें । जाली वृद्धी ॥ ३४॥

विषयसुख राहिले बाजूला, पण वांझपणाने दोघांना दुःखी केले. तेवढ्यात कुलदैवत प्रसन्न झाले आणि एकदाचे मूल झाले. (३४)

त्या लेंकुरावरी अतिप्रीति । दोघेहि क्षण येक न विशंभती ।
कांहीं जाल्या आक्रंदती । दीर्घस्वरें ॥ ३५॥

त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम जडले. दोघेही त्याला एक क्षणभरही विसंबत नसत. त्याला काही झाले तर ती जोरजोराने रडू लागत. (३५)

ऐसी ते दुःखिस्ते । पूजीत होती नाना दैवतें ।
तंव तेंहि मेलें अवचितें । पूर्व पापेंकरूनी ॥ ३६॥

अशी ती दुःखित दोघे नाना दैवतांची पूजा करीत होती, तोच पूर्वपापाच्या प्रभावाने ते मूलही अकस्मात मरण पावले. (३६)

तेणें बहुत दुःख जालें । घरीं आरंधें पडिलें ।
म्हणती आम्हांस कां ठीविलें । देवें वांज करूनी ॥ ३७॥

त्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झाले. परत घरी निपुत्रिकत्व आले. ती दोघे म्हणू लागली की, देवाने वांझ करून आम्हांला तरी कशाला ठेवले आहे ? (३७) .

आम्हांस द्रव्य काये करावें । तें जावें परी अपत्य व्हावें ।
अपत्यालागी त्यजावें । लागेल सर्व ॥ ३८॥

आम्हांला हे द्रव्य काय करायचे आहे ? हे सर्व गेले तरी चालेल पण मूल-बाळ होऊ दे. मुलासाठी सर्व सोडावे लागले तरी चालेल. (३८)

वांजपण संदिसें गेलें । तों मरतवांज नांव पडिलें ।
तें न फिटे कांहीं केलें । तेणें दुःखें आक्रंदती ॥ ३९॥

एक मूल झाल्याने वांझपण गेले होते; पण आता ते मूल गेल्याने ‘मरत वांझ’ (म्हणजे जिची मुले जगत नाहीत अशी स्त्री) नाव पडले आहे. ते नाव आता काही केल्या जात नाही, म्हणून त्या दुःखाने दोघे पुन्हा रडू लागली. (३९)

आमुची वेली कां खुंटिली । हा हा देवा वृत्ती बुडाली ।
कुळस्वामीण कां क्षोभली । विझाला कुळदीप ॥ ४०॥

आमची वंशवेली का बरेखुंटली ? हाय रे देवा, आमची वृत्ती का बरे बुडाली ? कुलस्वामिनी आमच्यावर कोपली तर नाही ना ? आमचा कुलदीप का बरे विझला ? (४०)

आतां लेंकुराचें मुख देखेन । तरी आनंदें राडी चालेन ।
आणी गळही टोंचीन । कुळस्वामिणीपासीं ॥ ४१॥

आता परत जर आम्हांला पुत्राचे मुख पाहावयास मिळाले, तर आनंदाने धगधगीत निखार्‍याच्या खाईतून चालन जाईन किंवा कुलस्वामिनीपुढे गळही टोचून घेईन. (४१)

आई भुता करीन तुझा । नांव ठेवीन केरपुंजा ।
वेसणी घालीन, माझा- । मनोरथ पुरवी । ४२॥

आई, त्या मुलाला तुझा ‘भुता’ सेवेकरी करीन. त्याचे नाव ‘केरपुंजा’ ठेवीन. त्याच्या नाकात नथणी घालीन. पण माझा एवढा मनोरथ पुरा कर (४२)

बहुत देवांस नवस केले । बहुत गोसावी धुंडिले ।
गटगटां गिळिले । सगळे विंचू ॥ ४३॥

याप्रमाणे अनेक देवांना त्यांनी नवस केले. पुष्कळ गोसावी धुंडले. सबंध विंचू गयगय गिळले (४३)

केले समंधास सायास । राहाणे घातलें बहुवस ।
केळें नारिकेळें ब्राह्मणास । अंब्रदानें दिधलीं ॥ ४४॥

समंधांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले. अंगात दैवत घालण्याचे नाना तव्हेने प्रयत्न केले ब्राह्मणांना केळी, नारळ आंबे इत्यादींची दाने दिली. (४४)

केलीं नाना कवटालें । पुत्रलोभें केलीं ढालें ।
तरी अदृष्ट फिरलें । पुत्र नाहीं ॥ ४५

नाना प्रकारचे तंत्रप्रयोग केले. पुत्रलोभाने क्षुद्र मंत्रप्रयोगही केले. तरीही नशीब फिरले आणि आणि पुत्र काही होईना. (४५)

वृक्षाअखालें जाऊन नाहाती । फळतीं झाडें करपती ।
ऐसे नाना दोष करिती । पुत्रलोभाकारणें ॥ ४६॥

पुत्र व्हावा म्हणून अस्पर्श असता वृक्षाखाली जाऊन न्हाणे, फळती झाडे जाळणे इत्यादी नाना पातके त्यांनी केली. (४६)

सोडून सकळ वैभव । त्यांचा वारयावेधला जीव ।
तंव तो पावला खंडेराव । आणी कुळस्वामिणी ॥ ४७॥

दोघांनी आपले सर्व वैभव सोडून दिले आणि त्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली. इतक्यात त्यांना खंडेराव आणि कुलस्वामिनी प्रसन्न झाली. ७)

आतां मनोरथ पुरती । स्त्रीपुरुषें आनंदती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ४८॥

आता आपले मनोरथ पूर्ण होतील, या विचाराने नवरा-बायको आनंदून गेली. श्री समर्थ म्हणतात की, आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे सांगेन ते लक्षपूर्वक ऐकावे. (४८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास तिसरा ॥ ३॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (ब) नाम’ समास तिसरा समाप्त.

समास चौथा : स्वगुणपरीक्षा (क)

॥ श्रीराम ॥

लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली ।
बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १॥

पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपून गेला. त्यामुळे त्यांना पोटभर खायला मिळेना. त्या बिचाऱ्यांवर भीक मागण्याची पाळी आली. (१)

लेंकुरें खेळती धाकुटीं । येकें रांगती येकें पोटीं ।
ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २॥

धाकटी काही मुले खेळत आहेत, कुणी रांगत आहेत तर कुणी गर्भात आहे. अशी घरभर पुत्र आणि कन्या यांची गर्दीच झाली. (२)

देवसेंदिवसा खर्च वाढला । यावा होता तो खुंटोन गेला ।
कन्या उपवरी जाल्या, त्यांला- । उजवावया द्रव्य नाहीं ॥ ३॥

दिवसेंदिवस खर्च वाढू लागला आणि आवक होती ती थांबून गेली. कन्या उपवर झाल्या पण त्यांचे विवाह करून द्यायला जवळ द्रव्य नाही, अशी स्थिती झाली. (३)

मायेबापें होतीं संपन्न । त्यांचें उदंड होतें धन ।
तेणें करितां प्रतिष्ठा मान । जनीं जाला होता ॥ ४॥

आईवडील श्रीमंत होते, त्यांच्याजवळ भरपूर धन होते. म्हणून लोकांत त्यांना चांगली प्रतिष्ठा, मान प्राप्त झाला होता. (४)

भरम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं ।
देवसेंदिवस अभ्यांतरीं । दरिद्र आलें ॥ ५॥

लोकांत अजून त्यांच्या श्रीमंतीबद्दल भ्रम होता, पण पहिली सुबत्ता घरात राहिली नव्हती. दिवसेंदिवस घरात दारिद्र्यच येत होते. (५)

ऐसी घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं ।
तेणें प्राणीयांस लागली । काळजी उद्वेगाची ॥ ६॥

अशा रीतीने घरसंसार वाढला. खाणारी माणसे वाढली. त्यामुळे त्याला उद्वेग व काळजी वाटू लागली. (६)

कन्या उपवरी जाल्या । पुत्रास नोवया आल्या ।
आतां उजवणा केल्या । पहिजेत कीं ॥ ७॥

कन्या उपवर झाल्या, पुत्रांना मुली सांगून येऊ लागल्या. आता मुलामुलींची लग्ने करायलाच हवीत, अशी परिस्थिती येऊन ठेपली. (७)

जरी मुलें तैसींच राहिलीं । तरी पुन्हां लोकलाज जाली ।
म्हणती कासया व्यालीं । जन्मदारिद्र्यें ॥ ८॥

मुले मुली लग्नाशिवाय तशीच राहिली तरी लोक नावे ठेवणारच. ते म्हणतील की, ‘हे जन्मदरिद्री होते, तर त्यांनी इतक्या मुलांना जन्म तरी कशाला दिला ?’ (८)

ऐसी लोकलाज हो‍ईल । वडिलांचें नांव जाईल ।
आतां रुण कोण दे‍ईल । लग्नापुरतें ॥ ९॥

अशा रीतीने लोकात कमीपणा येईल, वडिलांचे नाव जाईल. पण लग्ने करावीत तर लग्नापुरते कर्ज तरी कोणी देईल का, अशी काळजी उत्पन झाली. (९)

मागें रुण ज्याचें घेतलें । त्याचें परतोन नाहीं दिल्हें ।
ऐसें आभाळ कोंसळलें । उद्वेगाचें ॥ १०॥

मागे ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते, ते अद्याप परत केलेले नाही. असे निराशेचे आभाळच त्यांच्यावर कोसळले. (१०)

आपण खातों अन्नासी । अन्न खातें आपणासीं ।
सर्वकाळ मानसीं । चिंतातुर ॥ ११॥

आपण अन्न खातो खरे पण खरेतर अन्नच आपल्याला खात असते. याप्रकारे खाल्लेले अन्नही अंगी लागेना. असा तो मनात अत्यंत चिंतातुर झाला. (११)

पती अवघीच मोडली । वस्तभाव गाहाण पडिली ।
अहा देवा वेळ आली । आतां डिवाळ्याची ॥ १२॥

लोकांत जराही पत राहिली नाही. घरातील चीजवस्तू गहाण पडल्या. तो म्हणू लागला की, ‘अरे देवा, आता दिवाळखोरीची वेळ आली आहे.’ (१२)

कांहीं केला ताडामोडा । विकिला घरींचा पाडारेडा ।
कांहीं पैका रोकडा । कळांतरें काढिला ॥ १३॥

काही मोडतोड केली. घरची जनावरे विकली आणि व्याजाने काही रोकड पैसा उभा केला. (१३)

ऐसें रुण घेतलें । लोकिकीं दंभ केलें ।
सकळ म्हणती नांव राखिलें । वडिलांचें ॥ १४॥

याप्रकारे ऋण काढून लोकात खोटा मोठेपणा मिरवला. सगळे लोक म्हणू लागले की, ‘वडिलांचे नाव राखले बरं का !’ (१४)

ऐसें रुण उदंड जालें । रिणाइतीं वेढून घेतलें ।
मग प्रयाण आरंभिलें । विदेशाप्रती ॥ १५॥

अशा रीतीने खूप कर्ज झाले, तेव्हा सावकारांनी वेढून टाकले. तेव्हा त्याने विदेशी जाण्याचा विचार केला. (१५)

दोनी वरुषें बुडी मारिली । नीच सेवा अंगीकारिली ।
शरीरें आपदा भोगिली । आतिशयेंसीं ॥ १६॥

दोन वर्षे तो बेपत्ता झाला. तेथे नीच सेवा अंगीकारली आणि शरीराने अत्यंत कष्ट सोसले. (१६)

कांहीं मेळविलें विदेशीं । जीव लागला मनुष्यांपासीं ।
मग पुसोनियां स्वामीसी । मुरडता जाला ॥ १७॥

विदेशात काही द्रव्य मिळविले, पण जीव घरच्या माणसांत गुंतला होता. म्हणून मालकाची परवानगी घेऊन घराकडे परत फिरला. (१७)

तंव तें अत्यंत पीडावलीं । वाट पाहात बैसलीं ।
म्हणती दिवसगती कां लागली । काये कारणें देवा ॥ १८॥

घरी आल्यावर बघतो तर घरातील माणसे अत्यंत कष्ट भोगत असलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहात असलेली दिसली. ती म्हणत होती की, ‘देवा, त्यांना कोणत्या कारणाने घरी परतायला इतके दिवस लागले आहेत ? (१८)

आतां आम्ही काये खावें । किती उपवासीं मरावें ।
ऐसियाचे संगतीस देवें । कां पां घातलें आम्हांसी ॥ १९॥

आता आम्ही काय खावे, किती दिवस उपवास काढून मरावे ! देवाने आम्हांला अशा माणसाच्या संगतीत का बरे घातले आहे ?’ (१९)

ऐसें आपुलें सुख पाहाती । परी त्याचें दुःख नेणती ।
आणी शक्ती गेलियां अंतीं । कोणीच कामा न येती ॥ २०॥

याप्रमाणे सर्वजण आपल्या सुखाचा विचार करीत होते, पण त्याचे दुःख कुणीच जाणून घेत नव्हते आणि अंगातील शक्ती नाहीशी झाल्यावर तर शेवटी कोणीच उपयोगी पडत नाही. (२०)

असो ऐसी वाट पाहतां । दृष्टीं देखिला अवचिता ।
मुलें धावती, ताता । भागलास म्हणौनी ॥ २१॥

असो. याप्रमाणे त्याची वाट पाहात असता तो अचानक दृष्टीस पडला, तेव्हा ‘बाबा, तुम्ही किती भागलात ?’ असे म्हणत मुले त्याच्याजवळ धावत आली. (२१)

स्त्री देखोन आनंदली । म्हणे आमुची दैन्यें फिटली ।
तंव येरें दिधली । गांठोडी हातीं ॥ २२॥

बायकोने त्याला पाहिले तेव्हा तिला आनंद झाला. ती म्हणाली की, ‘ आता आमचे दैन्य फिटले !’ तेव्हा त्याने आपली पैशाची गाठोडी तिच्या हाती दिली. (२२)

सकळांस आनंद जाला । म्हणती आमुचा वडील आला ।
तेणें तरी आम्हांला । आंग्या टोप्या आणिल्या ॥ २३॥

सगळ्यांना आनंद झाला. आमचे वडील आले. त्यांनी आमच्यासाठी अंगरखे आणि टोप्या आणल्या आहेत, असे मुले म्हणू लागली. (२३)

ऐसा आनंद च्यारी देवस । सवेंच मांडिली कुसमुस ।
म्हणती हें गेलियां आम्हांस । पुन्हां आपदा लागती ॥ २४॥

पण हा आनंद चारच दिवस टिकला. मग लगेच सर्वांची कुरबुर सुरू झाली. सर्व म्हणू लागले की, आणलेला पैसा खर्च झाला की, आमचे हाल परत सुरू होतील. (२४)

म्हणौनी आणिलें तें असावें । येणें मागुतें विदेशास जावें ।
आम्ही हें खाऊं न तों यावें । द्रव्य मेळऊन ॥ २५॥

म्हणून त्यांनी जे द्रव्य वगैरे आणले आहे, ते येथेच ठेवावे व त्यांनी परत विदेशास जावे. आणि आम्ही हे खाऊन संपण्याचे आत द्रव्य मिळवून परत यावे. (२५)

ऐसी वासना सकळांची । अवघीं सो‍ईरीं सुखाचीं ।
स्त्री अत्यंत प्रीतीची । तेहि सुखाच लागली ॥ २६॥

सगळ्यांची इच्छा या प्रकारची होती. प्रपंचात सर्व नाती केवळ त्यांच्या त्यांच्या सुखापुरतीच असतात. बायको अत्यंत प्रेम करीत असली तरी ती तिच्या स्वतःच्या सुखासाठीच करीत असते. (२६)

विदेसीं बहु दगदला । विश्रांती घ्यावया आला ।
स्वासहि नाहीं टाकिला । तों जाणें वोढवलें ॥ २७॥

परदेशात त्याला खूप परिश्रम झाले होते, म्हणून खरे तर तो विश्रांती घेण्यासाठी घरी आला होता. पण घरी येऊन श्वास टाकतो न टाकतो तोपर्यंत परत जाण्याची पाळी आली. (२७)

पुढें अपेक्षा जोसियांची । केली विवंचना मुहूर्ताची ।
वृत्ति गुंतली तयाची । जातां प्रशस्त न वटे ॥ २८॥

नंतर ज्योतिष्याला विचारून जाण्यासाठी मुहूर्त शोधला, पण त्याची वृत्ती घरात गुंतली असल्याने जाणे त्याला प्रशस्त वाटेना. (२८)

माया मात्रा सिद्ध केली । कांहीं सामग्री बांधली ।
लेंकुरें दृष्टीस पाहिलीं । मार्गस्त जाला ॥ २९॥

जावयाचे म्हणून काही द्रव्य व फराळाचे साहित्य तयार केले. इतर काही सामग्रीही एकत्र बांधून घेतली, मुलाबाळाकडे डोळे भरून पाहिले आणि मार्गाला लागला. (२९)

स्त्रियेस अवलोकिलें । वियोगें दुःख बहुत वाटलें ।
प्रारब्धसूत्र तुकलें । रुणानबंधाचें ॥ ३०॥

इतक्यात बायकोकडे नजर गेली, तेव्हा वियोगाचे फार दुःख झाले. वियोगाच्या ऋणानुबंधाचे प्रारब्ध बळावल्याने इच्छेविरुद्ध जाणे भाग पडले. (३०)

कंठ सद्गसदित जाला । न संवरेच गहिवरला ।
लेंकुरा आणी पित्याला । तडातोडी जाली ॥ ३१॥

दुःखाने कंठ सद्‌गदित झाला. गहिवर आवरेनासा झाला. मुलांची आणि बापाची ताटातूट झाली. (३१)

जरी रुणानुबंध असेल । तरी मागुती भेटी हो‍ईल ।
नाहीं तरी संगती पुरेल । येचि भेटीनें तुमची ॥ ३२॥

जर ऋणानुबंध असेल, तर आपली परत भेट होईल. नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजावी. (३२)

ऐसीं बोलोन स्वार होये । मागुता फीरफिरों पाहे ।
वियोगदुःख न साहे । परंतु कांहीं न चले ॥ ३३॥

असे म्हणून तो घोड्यावर स्वार झाला, पण वारंवार मागे वळून पाहू लागला. वियोगदुःख सहन होईना, परंतु जाणे भागच पडले. दुसरा काही उपायच उरला नाही. (३३)

आपुला गांव राहिला मागें । चित्त भ्रमलें संसारौद्वेगें ।
दुःखवला प्रपंचसंगें । अभिमानास्तव ॥ ३४॥

पाहता पाहता आपला गाव मागे राहिला संसाराच्या उद्वेगाने चित्त भ्रमले. देहाभिमान धरून प्रपंचाची संगत केल्याने त्याला दुःख भोगावे लागले (३४)

ते समईं माता आठवली । म्हणे म्हणे धन्य ते माउली ।
मजकारणें बहुत कष्टली । परी मी नेणेंचि मूर्ख ॥ ३५॥

त्यावेळी त्याला आईची आठवण झाली. तो म्हणू लागला की खरोखर ती माउली धन्य. माझ्यासाठी तिने फार कष्ट सोसले पण त्यावेळी मला मूर्खाला हे कळले नाही. (३५)

आजी जरी ते असती । तरी मजला कदा न विशंभती ।
वियोग होतां आक्रंदती । ते पोटागि वेगळीच ॥ ३६॥

आज जर ती जिवंत असती तर तिने मला कधीही दूर परदेशात जाऊ दिले नसते. माझा वियोग होताच तिला अत्यंत दुःख झाले असते व ती आक्रोश करू लागली असती. आईचा कळवळा वेगळाच असतो. (३६)

पुत्र वैभवहीन भिकारी । माता तैसाचि अंगिकारी ।
दगदला देखोन अंतरीं । त्याच्या दुःखें दुःखवे ॥ ३७॥

पुत्र वैभवहीन अगदी भिकारी जरी असला, तरी माता त्याचा जसा असेल तसा स्वीकार करते. त्याला कष्ट झालेले दिसले तर त्याच्या दुःखाने ती दुःखी होते. (३७)

प्रपंच विचारें पाहातां । हें सकळ जोडे न जोडे माता ।
हें शरीर जये करितां । निर्माण जालें ॥ ३८॥

प्रपंचाबद्दल विचार करून पाहिला तर असे दिसते की बाकी सर्व गोष्टी मिळू शकतात, पण जिच्यामुळे हे शरीर निर्माण झाले, ती आई मात्र परत मिळत नाही. (३८)

लांव तरी ते माया । काय कराविया सहश्र जाया ।
परी भुलोन गेलों वायां । मकरध्वजाचेनी ॥ ३९॥

आई स्वभावाने कर्कश असली तरी आईची माया खरी असते. हजार स्त्रिया असल्या तरी ते प्रेम त्यांच्याजवळ नसते. पण कामवासनेच्या बळाने मी हे सर्व अगदी विसरून गेलो. (३९)

या येका कामाकारणें । जिवलगांसिं द्वंद घेणें ।
सखीं तींच पिसुणें । ऐसीं वाटतीं ॥ ४०॥

या एका कामवासनेच्या नादाने जिवलगांशी मी कलह केला. हितकर्ते मित्र मला शत्रूप्रमाणे वाटले. (४०)

म्हणौन धन्य धन्य ते प्रपंची जन । जे मायेबापाचें भजन ।
करिती न करिती, मन- । निष्ठुर जिवलगांसीं ॥ ४१॥

म्हणून जे लोक आईवडिलांची भक्ती करतात आणि जिवलग माणसांविषयी मन निष्ठर करीत नाहीत, ते धन्य होत. (४१)

संगती स्त्रीबाळकाची । आहे साठी जन्माची ।
परी मायेबापीं कैंचीं । मिळतील पुढें ॥ ४२॥

बायको व मुलांची सोबत आपल्याला जन्मभर लाभते, पण आईवडिलांचा सहवास फार थोडा मिळतो. त्यांची संगत पुढे कशी बरे मिळेल ? (४२)

ऐसें पूर्वीं होतें ऐकिलें । परी ते समईं नाहीं कळलें ।
मन हें बुडोन गेलें । रतिसुखाचा डोहीं ॥ ४३॥

मी पूर्वी हे सगळे ऐकले होते, पण त्यावेळी ते कळले नाही. माझे मन रतिसुखाचे डोहात अगदी बुडून गेले होते. (४३)

हे सखीं वाटती परी पिसुणें । मिळाली वैभवाकारणें ।
रितें जातां लाजिरवाणें । अत्यंत वाटे ॥ ४४॥

ज्यांना मी मित्र समजत होतो, ते लबाड होते. माझ्याजवळील पैशाच्या लोभाने ते माझ्याभोवती जमले होते. आता मोकळ्या हाताने परत जायची मला अत्यंत लाज वाटत आहे. (४४)

आता भलतैसें करावें । परि द्रव्य मेळऊन न्यावें ।
रितें जातां स्वभावें । दुःख आहे ॥ ४५

आता काय वाटेल ते करावे, परंतु द्रव्य मिळवूनच परत फिरले पाहिजे. मोकळ्या हाताने परत गेलो, तर स्वाभाविकच दुःख होणार. (४५)

ऐसी वेवर्धना करी । दुःख वाटलें अंतरीं ।
चिंतेचिये माहापुरीं । बुडोन गेला ॥ ४६॥

अशी विवंचना करीत असता त्याला मनात अत्यंत दुःख झाले. चिंतेच्या महापुरात जणू काही तो बुडून गेला. (४६)

ऐसा हा देह आपुला । असतांच पराधेन केला ।
ईश्वरीं कानकोंडा जाला । कुटुंबकाबाडी ॥ ४७॥

तो मनात म्हणू लागला की, हा देह माझा असता मी पराधीन झालो आणि ईश्वरविषयक कर्तव्याकडेदुर्लक्ष करून केवळ कुटुंबासाठी काबाडकष्ट करीत राहिलो. (४७)

या येका कामासाठीं । जन्म गेला आटाटी ।
वय वेचल्यां सेवटीं । येकलेंचि जावें ॥ ४८॥

या एका कामवासनेपायी जन्मभर आटापिटा केला. आता म्हातारपण आले आहे. आयुष्याच्या शेवटी एकट्यालाच जावे लागणार आहे. (४८)

ऐसा मनीं प्रस्तावला । क्षण येक उदास जाला ।
सवेंचि प्राणी झळंबला । मायाजाळें ॥ ४९॥

अशा प्रकारे विचार करीत असता त्याला मनात फार पश्चात्ताप झाला व एक क्षणभर तो खिन्न झाला. पण लगेचच तो मुलालेकरांच्या ममतेने मोहित होऊन मायेच्या जाळ्यात अडकला. (४९)

कन्यापुत्रीं आठवलीं । मनींहुनि क्षिती वाटली ।
म्हणे लेंकुरें अंतरलीं । माझीं मज ॥ ५०॥

मुलामुलींची आठवण होऊन मनात फार दुःख झाले आणि म्हणू लागला की, ‘माझी लेकरे मला दुरावली.’ (५०)

मागील दुःख आठवलें । जें जें होतें प्राप्त जालें ।
मग रुदन आरंभिलें । दीर्घ स्वरें ॥ ५१॥

मागे जे जे काही दुःख भोगले होते, त्याची आठवण होऊन तो दुःखी झाला आणि मोठमोठ्याने रडू लागला. (५१)

आरुण्यरुदन करितां । कोणी नाहीं बुझाविता ।
मग होये विचारिता । आअपुले मनीं ॥ ५२॥

पण अरण्यात त्याचे रडणे ऐकून त्याला समजाविणारे कुणीच नसल्याने त्याने धैर्य धरले व तो आपल्याच मनाशी विचार करू लागला. (५२)

आतां कासया रडावें । प्राप्त होतें तें भोगावें ।
ऐसे बोलोनिया जीवें । धारिष्ट केलें ॥ ५३॥

आता रडून काय उपयोग आहे ? जे प्रारब्धाने प्राप्त होते, ते भोगावेच लागते. असे म्हणून त्याने मनास धीर दिला. (५३)

ऐसा दुःखें दगदला । मग विदेशाप्रती गेला ।
पुढे प्रसंग वर्तला । तो सावध ऐका ॥ ५४॥

याप्रमाणे दुःखाने थकला भागलेला तो मग विदेशी गेला. श्री समर्थ म्हणतात की, पुढे काय प्रसंग घडला, तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावा. (५४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास चवथा ॥ ४॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (क) नाम’ समास चौथा समाप्त.

समास पाचवा : स्वगुणपरीक्षा ( ड )

॥ श्रीराम ॥

पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला व्यासंगासी ।
आपल्या जिवेसीं सोसी । नाना श्रम ॥ १॥

श्रीसमर्थ सांगतात की, याप्रमाणे पुढे विदेशात जाऊन व्यवसाय करायला सुरुवात केली व त्यासाठी तो जिवापाड नाना प्रकारचे कष्ट सोसू लागला. (१)

ऐसा दुस्तर संसार । करितां कष्टला थोर ।
पुढें दोनी च्यारी संवत्सर । द्रव्य मेळविलें ॥ २॥

याप्रमाणे प्रपंच करीत असता त्याला अत्यंत कष्ट झाले. पुढे दोन चार वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळविले. (२)

सवेंचि आला देशासी । तों आवर्षण पडिलें देसीं ।
तेणें गुणें मनुष्यांसी । बहुत कष्ट जाले ॥ ३॥

मग लगेच तो स्वदेशास परत आला. तो तेथे दुष्काळ पडला होता व त्यामुळे सर्व माणसांना अत्यंत कष्ट भोगावे लागत होते. (३)

येकांच्या बैसल्या अमृतकळा । येकांस चंद्री लागली डोळां ।
येकें कांपती चळचळा । दैन्यवाणीं ॥ ४॥

कुणाची गालफडे बसली होती तर कुणाचे डोळे निस्तेज झाले होते, कोणी अत्यंत दीन होऊन थरथरा कापत होते. (४)

येकें दीनरूप बैसलीं । येकें सुजलीं येकें मेलीं ।
ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळां ॥ ५॥

कोणी भिकल्यासारखी बसलेली, तर कुणाच्या अंगावर सूज आलेली, तर कोणी मरून गेलेली, अशी आपल्या मुलामुलींची अवस्था झालेली त्याने बघितली. (५)

तेणें बहुत दुःखी जाला । देखोनिया उभड आला ।
प्राणी आक्रंदों लागला । दैन्यवाणा ॥ ६॥

ते सर्व पाहून तो अत्यंत दुःखी झाला. त्याला गहिवरून आले व तो दीन होऊन आक्रोश करू लागला. (६)

तंव तीं अवघीं सावध जालीं । म्हणती बाबा बाबा जेऊं घाली ।
अन्नालागीं मिडकलीं । झडा घालिती ॥ ७॥

तेव्हा ती सर्व मुले सावध झाली आणि ‘बाबा, बाबा, आम्हांल जेवू घाल’ असे म्हणू लागली. अन्नासाठी आशाळभूत झालेली असल्याने त्याच्या अंगावर त्यांनी झडपच घातली. (७)

गांठोडें सोडून पाहाती । हातां पडिलें तेंचि खाती ।
कांहीं तोंडीं कांहीं हातीं । प्राण जाती निघोनी ॥ ८॥

पोरांनी बापाचे गाठोडे सोडून पाहिले व जे हाताला येईल ते ती खाऊ लागली. आणि काही अन्न तोंडात तर काही हातात असतानाच काही जणांचे प्राण निघून गेले (८)

तांतडी तांतडी जे‍ऊं घाली । तों तें जेवितां जेवितां कांहीं मेलीं ।
कांहीं होतीं धादावलीं । तेंहि मेलीं अजीर्णें ॥ ९॥

तो घाईघाईने त्यांना जेवू घालू लागला, तर जेवता जेवताच काही मेली. काही अत्यंत भुकेली होती, त्यांनी जास्त खाल्याने ती अजीर्ण होऊन मेली. (९)

ऐसीं बहुतेकें मेलीं । येक दोनीं मुलें उरलीं ।
तेंहि दैन्यवाणीं जालीं । आपलें मातेवांचुनी ॥ १०॥

अशा प्रकारे बहुतेक मुले मेली. एक-दोन उरली, पण तीही आपल्या आईवाचून अत्यंत दीनवाणी झाली. (१०)

ऐसे आवर्षण आलें । तेणें घरचि बुडालें ।
पुढें देसीं सुभिक्ष जालें । आतिशयेंसी ॥ ११॥

अशा रीतीने दुष्काळ पडल्याने त्याचे सर्व घरच बसले काही दिवसांनंतर देशात अन्नधान्याची अतिशय समृद्धी झाली. (११)

लेकुरां नाहीं वाढवितें । अन्न करावें लागे आपुलेन हातें ।
बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२॥

घरात मुलांना वाढविणारे कुणी राहिले नव्हते. स्वतःच्या हाताने अन्न शिजवावे लागे. स्वयंपाक करण्याचा त्याच्या मनाला फार त्रास वाटू लागला. (१२)

लोकीं भरीस घातलें । पुन्हां मागुतें लग्न केलें ।
द्रव्य होतें तें वेचलें । लग्नाकारणें ॥ १३॥

लोकांनी भरीला घातले म्हणून त्याने पुन्हा लग्न केले. जे द्रव्य मिळविले होते, ते लग्ननासाठी खर्च झाले. (१३)

पुन्हां विदेशासी गेला । द्रव्य मेळऊन आला ।
तव घरीं कळहो लागला । सावत्र पुत्रांसी ॥ १४॥

म्हणून तो परत विदेशी गेला व पुन्हा द्रव्य मिळवून परत आला. तो घरी बायको आणि सावत्र मुलांच्यात भांडणास सुरुवात झाली होती. (१४)

स्त्री जाली न्हातीधुती । पुत्र देखों न सकती ।
भ्रताराची गेली शक्ती । वृद्ध जाला ॥ १५॥

त्याची बायको वयात येऊन शहाणी झाली होती, ते मुलांना बघवेना. नवरा वृद्ध झाल्याने त्याच्या अंगी काहीच शक्ती उरली नव्हती. (१५)

सदा भांडण पुत्रांचें । कोणी नायकती कोणाचें ।
वनिता अति प्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६॥

मुलांमध्ये आपसांत सारखी भांडणे सुरू झाली. कोणी कोणाचे ऐकेना. त्याचे मन मात्र बायकोवर अत्यंत आसक्त झाले. (१६)

किंत बैसला मनां । येके ठाई पडेना ।
म्हणोनियां पांचा जणा । मेळविलें ॥ १७॥

एकमेकांबद्दल त्यांच्या मनांत संशय उत्पन्न झाला. काही केल्या एकमत होईना, म्हणून त्याने पंचांना बोलावून आणले. (१७)

पांच जण वांटे करिती । तों ते पुत्र नायेकती ।
निवाडा नव्हेचि अंतीं- । भांडण लागलें ॥ १८॥

पंचांनी वाटण्या करून दिल्या, पण मुलांना ते पटेना व ती ऐकेनात. काहीच निवाडा झाला नाही आणि शेवटी परत भांडणे सुरू झाली. (१८)

बापलेकां भांडण जालें । लेंकीं बापास मारिलें ।
तंव ते मातेनें घेतलें । शंखतीर्थ ॥ १९॥

बापाचे व मुलांचे भांडण जुंपले आणि मुलांनी बापाला मारले. ते पाहून आईने शंखध्वनी करायला सुरुवात केली. (१९)

ऐकोनि मेळले लोक । उभे पाहाती कौतुक ।
म्हणती बापास लेक । कामा आले ॥ २०॥

तिने बोंब मारलेली ऐकून तेथे लोक गोळा झाले आणि उभे राहून गंमत पाहू लागले. ते म्हणू लागले की ‘वा, मुले बापाच्या चांगली उपयोगी पडली !’ (२०)

ज्या कारणें केले नवस । ज्या कारणें केले सायास ।
ते पुत्र पितीयास । मारिती पहा ॥ २१॥

ज्या मुलांसाठी बापाने नवस केले, अनेक कष्ट उपसले, तीच मुले आता बापाला मारीत आहेत, पाहा ! (२१)

ऐसी आली पापकळी । आश्चिर्य मानिलें सकळीं ।
उभे तोडिती कळी । नगरलोक ॥ २२॥

असा हा पापमय कलह पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटले. मग तेथे गावातील जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटविले. (२२)

पुढें बैसोन पांच जण । वांटे केले तत्समान ।
बापलेंकांचें भांडण । तोडिलें तेहीं ॥ २३॥

पुढे पाच जणांनी बसून समसमान वाटे केले आणि त्यांनी ते बाप-लेकांचे भांडण एकदाचे मिटवले. (२३)

बापास वेगळें घातलें । कोंपट बांधोन दिधलें ।
मन कांतेचें लागलें । स्वार्थबुद्धी ॥ २४॥

त्या मुलांनी बापाला वेगळे काढले आणि एक खोपटे बांधून दिले बायकोच्या मनातही स्वार्थबुद्धी उत्पन्न झाली. (२४)

कांता तरुण पुरुष वृद्ध । दोघांस पडिला संमंध ।
खेद सांडून आनंद । मानिला तेहीं ॥ २५॥

बायको तरुण आणि नवस म्हातारा असा घरात या दोघांचाच संबंध उरला. तेव्हा खेद न करता दोघांनी त्यातच आनंद मानला. (२५)

स्त्री सांपडली सुंदर । गुणवंत आणी चतुर ।
म्हणे माझें भाग्य थोर । वृद्धपणीं ॥ २६॥

‘मला म्हातारपणी सुंदर गुणवंत आणि चतुर बायको मिळाली, हे माझे केवढे थोर भाग्य !’ असे तो म्हणू लागला. (२६)

ऐसा आनंद मानिला । दुःख सर्वही विसरला ।
तंव तो गल्बला जाला । परचक्र आलें ॥ २७॥

याप्रमाणे मागील सर्व दुःख विसरून त्याने आनंद मानला. इतक्यात चहूकडे आरडाओरडा झाला की शत्रूची धाड आली आहे. (२७)

अकस्मात धाडी आली । कांता बंदीं धरून नेली ।
वस्तभावही गेली । प्राणीयाची ॥ २८॥

अकस्मात धाड आली आणि शत्रूने त्याच्या बायकोला कैद करून धरून नेली. एवढेच नव्हे तर त्याची सर्व चीजवस्तूही गेली. (२८)

तेणें दुःख जालें भारीं । दीर्घ स्वरें रुदन करी ।
मनीं आठवे सुंदरी । गुणवंत ॥ २९॥

त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले व तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या सुंदर गुणसंपन्न बायकोची मनात त्याला आठवण येऊ लागली. (२९)

तंव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्टली ।
ऐकोनियां आंग घाली । पृथ्वीवरी ॥ ३०॥

तोपर्यंत बातमी आली की, ‘तुमच्या बायकोला भ्रष्ट केले आहे !’ हे ऐकताच तो दुःखाने धाडकन जमिनीवर कोसळला. (३०)

सव्य अपसव्य लोळे । जळें पाझरती डोळे ।
आठवितां चित्त पोळे । दुःखानळें ॥ ३१॥

डाव्या, उजव्या कुशीवर तो गडबडा लोळू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. बायकोची आठवण येऊन त्या दुःखाने त्याचे चित्त पोळू लागले. (३१)

द्रव्य होतें मेळविलें । तेंही लग्नास वेचलें ।
कांतेसिही धरून नेलें । दुराचारी ॥ ३२॥

‘ मी काही द्रव्य मिळविले होते, तेही लग्नासाठी खर्च केले आणि आता दुराचारी लोकांनी माझ्या बायकोलाही धरून नेली.’ (३२)

मजही वृद्धाप्य आलें । लेंकीं वेगळें घातलें ।
अहा देवा वोढवलें । अदृष्ट माझें ॥ ३३॥

‘मलाही आता म्हातारपण आले आहे आणि त्यात मुलांनी मला वेगळे काढले आहे. देवा, हे केवढे दुर्देव माझ्यावर ओढवले आहे ! (३३)

द्रव्य नाहीं कांता नाहीं । ठाव नाहीं शक्ति नाहीं ।
देवा मज कोणीच नाहीं । तुजवेगळें ॥ ३४॥

माझ्याजवळ आता पैसा-अडका नाही, बायकोही नाही ! घरही गेले शक्तीही उरली नाही ! देवा, आता तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीच उरलेले नाही !’ (३४)

पूर्वीं देव नाहीं पुजिला । वैभव देखोन भुलला ।
सेखीं प्राणी प्रस्तावला । वृद्धपणीं ॥ ३५॥

पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभवाला भुलला आणि शेवटी म्हातारपणी त्याला पश्चात्ताप होऊ लागला. (३५)

देह अत्यंत खंगलें । सर्वांग वाळोन गेलें ।
वातपीत उसळलें । कंठ दाटला कफें ॥ ३६॥

देह अत्यंत खंगला. सर्वांग वाळून गेले. वात, पित्त उसळले. कंठ कफाने दाटून आला. (३६)

वळे जिव्हेची बोबडी । कफें कंठ घडघडी ।
दुर्गंधी सुटली तोंडीं । नाकीं स्लेष्मा वाहे । ३७॥

जिभेची बोबडी वळली, कफाने घसा घरघरू लागला, तोंडातून दुर्गंधी सुटली, नाकातून शेंबूड वाहू लागला. (३७)

मान कांपे चळचळां । डोळे गळती भळभळां ।
वृद्धपणीं अवकळा । ठाकून आली ॥ ३८॥

मान चळचळा कापू लागली, डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले, वृद्धपणात अशी ही अवकळा प्राप्त झाली. (३८)

दंतपाटी उखळली । तेणें बोचरखिंडी पडिली ।
मुखीं लाळ गळों लागली । दुर्गंधीची ॥ ३९॥

दातांची कवळी उखडल्यामुळे बोळके झाले. तोंडातून अति दुर्गंध असलेली लाळ गळू लागली. (३९)

डोळां पाहातां दिसेना । कानीं शब्द ऐकेना ।
दीर्घ स्वरें बोलवेना । दमा दाटे ॥ ४०॥

डोळ्यांनी नीट दिसेना, कानांनी शब्द ऐकू येईना, मोठ्याने बोलताही येईना, कारण दमा वाढू लागला. (४०)

शक्ती पायांची राहिली । बैसवेना मुरुकुंडी घाली ।
बृहती वाजों लागली । तोंडाच ऐसी ॥ ४१॥

पायांतील शक्ती नाहीशी झाली. बसता येईनासे झाले. म्हणून मुरकुंडी घालून पडून राहू लागला. तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले. (४१)

क्षुधा लागतां आवरेना । अन्न समईं मिळेना ।
मिळालें तरी चावेना । दांत गेले ॥ ४२॥

भूक आवरेनाशी झाली. भुकेच्या वेळी अन्न मिळेना आणि मिळाले तरी दात पडून गेल्याने ते चावता येईना. (४२)

पित्तें जिरेना अन्न । भक्षीतांच होये वमन ।
तैशेंचि जाये निघोन । अपानद्वारें ॥ ४३॥

पित्तामुळे अन्न पचेना, खाताक्षणीच ते ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे निघून जाऊ लागले. (४३)

विष्टा मूत्र आणि बळस । भोवता वमनें केला नास ।
दुरून जातां कोंडे स्वास । विश्वजनाचा ॥ ४४॥

विष्ठा, मूत्र आणि नाकातोंडातील मळ व ओकारी यामुळे त्याच्या आजूबाजूला सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. या घाणीमुळे दुरून जाऊ लागले, तरी सुद्धा लोकांचा श्वास कोंडू लागला. (४४)

नाना दुःखें नाना व्याधी । वृद्धपणीं चळे बुद्धी ।
तर्ह्हीं पुरेना आवधी । आयुष्याची ॥ ४५॥

याप्रमाणे नाना दुःखे व नाना रोग यामुळे म्हातारपणी त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली. तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना. (४५)

पापण्या भवयाचे केंश । पिकोन झडले निःशेष ।
सर्वांगीं लोंबलें मांस । चिरकुटासारिखें ॥ ४६॥

पापण्यांचे, भुवयांचे केस पिकून पूर्णपणे गळून गेले. सर्वांगावरील मांस एखाद्या जुन्या कापडासारखे लोंबू लागले. (४६)

देह सर्व पाअरिखें जालें । सवंगडे निःशेष राहिले ।
सकळ प्राणीमात्र बोले । मरेना कां ॥ ४७॥

देह पूर्णपणे पराधीन झाला. कोणी सवंगडीही उरले नाहीत. सर्व लोक म्हणू लागले की, ‘हा एकदाचा मरत का नाही ?’ (४७)

जें जन्मून पोसलीं । तेंचि फिरोन पडिलीं ।
अंतीं विषम वेळ आली । प्राणीयासी ॥ ४८॥

ज्यांना जन्म देऊन त्यांचे पालन-पोषण केले ती मुले विरुद्ध झाली. शेवटी त्याला फार कठीण काळ आला. (४८)

गेलें तारुण्य गेलें बळ । गेलें संसारीचें सळ ।
वाताहात जालें सकळ । शरीर आणी संपत्ती ॥ ४९॥

तारुण्य गेले, अंगातली शक्ती गेली, संसाराची मस्तीही गेली. अशा प्रकारे शक्ती आणि संपत्ती जाऊन सर्व वाताहात झाली. (४९)

जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाहि वेर्थ गेला ।
कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥ ५०॥

जन्मभर स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला आणि शेवटी अंतकाळी अशी विषम परिस्थिती प्राप्त झाली. (५०)

सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी जाला ।
पुढें मागुता धोका आला । येमयातनेचा ॥ ५१॥

सुखासाठी झुरला, पण शेवटी दुःखीकष्टी झाला आणि पुढे यमयातनेचा धोका तर आहेच. (५१)

जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
म्हणोनियां तत्काळ । स्वहित करावें ॥ ५२॥

सारांश, जन्म हेच सर्व दुःखाचे मूळ असून त्याला दुःखाची इंगळी सारखी डसतच असते, म्हणून माणसाने तत्काळ स्वहित साधावे. (५२)

असो ऐसें वृद्धपण । सकळांस आहे दारुण ।
म्हणोनियां शरण । भगवंतास जावें ॥ ५३॥

श्री समर्थ म्हणतात, की असो. याप्रमाणे सर्वांना असे दारुण वृद्धपण येणारच आहे, म्हणून प्रत्येकाने भगवंतास शरण जावे. (५३)

पुढें वृद्धीस तत्वतां । गर्भीं प्रस्तावा होता ।
तोचि आला मागुता । अंतकाळीं ॥ ५४॥

गर्भावस्थेत जीवाला जसा पश्चात्ताप झाला होता, तसाच तो तत्त्वतः त्याला वृद्धपणी होतो आणि तोच पुन्हा अंतकाळीही होतो. (५४)

म्हणौनि मागुतें जन्मांतर । प्राप्त मातेचें उदर ।
संसार हा अति दुस्तर । तोचि ठाकून आला ॥ ५५॥

म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मातेच्या उदरात काही काळ राहावे लागते आणि तरून जाण्यास कठीण असा हा संसार परत त्याच्यापुढे उभा राहतो. (५५)

भगवद्भहजनावांचुनी । चुकेना हे जन्मयोनि ।
तापत्रयांची जाचणी । सांगिजेल पुढे ॥ ५६॥

या प्रकारे गर्भवास व जन्म यांतून भगवद्‌भजनावाचून सुटका होत नाही. आता पुढील समासात तीन तापांचा जाच कसा असतो ते सांगितले जाईल. (५६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास पाचवा ॥ ५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (ड) नाम’ समास पाचवा समाप्त.

समास सहावा : आध्यात्मिक ताप

॥ श्रीराम ॥

तापत्रयाचें लक्षण । आतां सांगिजेल निरूपण ।
श्रोतीं करावें श्रवण । यकाग्र हो‍ऊनी ॥ १॥

श्री समर्थ म्हणतात की, मी आता तापत्रयाच्या लक्षणांचे नीट वर्णन करतो. ते श्रोत्यांनी एकाग्र होऊन श्रवण करावे. (१)

जो तापत्रैं पोळला । तो संतसंगें निवाला ।
आर्तभूत तोषला । पदार्थ जेवी ॥ २॥

तापलेला पदार्थ जसा पाण्याने निवतो, तसा तापत्रयाने जो पोळतो, तो संतसमागमाने निवतो, शांत होतो. (२)

क्षुधाक्रांतास मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन ।
बंदीं पडिल्याचें बंधन- । तोडिनां, सुख ॥ ३॥

भुकेलेल्यास अन्न मिळावे किंवा तहानलेल्यास पाणी मिळावे किंवा बंधनात पडलेल्याची बंधनातून सुटका व्हावी, त्याप्रमाणे त्याला सुख प्राप्त होते. (३)

माहापुरें जाजावला । तो पैलतीरास नेला ।
कां तो स्वप्नींचा चे‍इला । स्वप्नदुःखी ॥ ४॥
कोणी येकासी मरण- । येतां, दिलें जीवदान ।
संकटास निवारण । तोडितां सुख ॥ ५॥

किंवा महापुरात घाबरलेल्यास पैलतीरास नेला असता तो जसा सुखी होतो किंवा स्वप्नदुःखाने दुःखी झालेल्यास जागे करावे किंवा कुणाचे मरण ओढवले असता त्याला जीवनदान द्यावे किंवा एखादा संकटात सापडला असता युक्तिप्रयुक्तीने त्याचे संकट निवारण केल्यावर त्यास जसे सुख होते. (४-५)

रोगियास औषध । सप्रचित आणी शुद्ध ।
तयासी होये आनंद । आरोग्य होतां ॥ ६॥

किंवा रोग्याला अनुभवसिद्ध असे खात्रीचे आणि उत्तम औषध मिळून आरोग्य प्राप्त झाले असता त्याला जसा आनंद होतो. (६)

तैसा संसारें दुःखवला । त्रिविधतापें पोळला ।
तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ॥ ७॥

त्याप्रमाणे संसारातील दुःखाने जो गांजलेला असतो, त्रिविध तापाने जो पोळलेला असतो, तोच एक परमार्थ मिळण्यास अधिकारी ठरतो. (७)

ते त्रिविध ताप ते कैसे । आतां बोलिजेत तैसे ।
येविषईं येक असे । वाक्याधार ॥ ८॥

ते त्रिविध ताप कसे असतात, ते आता मी सांगतो. याविषयी एक वाक्याधार आहे. (८)

श्लोक ॥ देहेंद्रियप्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते ।
इममाध्यात्मिकं तापं जायते दुःक देहिनाम् ॥ १ ॥

श्लोक १ अर्थ – देह इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख भोगावे लागते, त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. (१)

सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥ २ ॥

श्लोक २ अर्थ – सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते, तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे. तो खरोखर आधिभौतिक ताप होय. (२)

शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
स्वर्गनरकादिं भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥ ३ ॥

श्लोक ३ अर्थ – माणसाच्या चांगल्या-वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर यमयातना, स्वर्ग, नरक वगैरे जे भोग भोगावे लागतात, त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. (३)

येक ताप आध्यात्मिक । दुजा तो आदिभूतिक ।
तिसरा आदिदैविक । ताप जाणावा ॥ ९॥

एका तापास आध्यात्मिक ताप म्हणतात. दुसरा जो ताप त्यास आधिभौतिक म्हणतात आणि तिसरा ताप तो आधिदैविक जाणावा. (९)

आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण ।
आदिभूतिकांचें लक्षण । जाणिजे कैसें ॥ १०॥

आध्यात्मिक ताप म्हणजे काय, तो कसा ओळखावा, तसेच आधिभौतिक तापाचे लक्षण ते कसे जाणावे ? (१०)

आदिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा ।
हेंहि विशद कळे ऐसा । विस्तार कीजे ॥ ११॥

आधिदैविक ताप कसा असतो, त्याची अवस्था कोणती, हे सर्व स्पष्टपणे कळेल अशा प्रकारे विस्तार करून सांगा. (११)

हां जी म्हणोनि वक्ता । जाला कथा विस्तारिता ।
आध्यात्मिक ताप आतां । सावध ऐका ॥ १२॥

त्यावर वक्ता ‘हां जी’ असे म्हणून विस्तारपूर्वक सांगता झाला. तरी आता आध्यात्मिक तापासंबंधीचे निरूपण सावध होऊन ऐका. (१२)

देह इंद्रिय आणी प्राण । यांचेनि योगें आपण ।
सुखदुःखें सिणे जाण । या नांव आध्यात्मिक ॥ १३॥

देह इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने आपणास सुख-दुःख होऊन जो त्रास होतो, त्या तापाला आध्यात्मिक ताप असे नाव आहे. (१३)

देहामधून जें आलें । इंद्रियें प्राणें दुःख जालें ।
तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रईं ॥ १४॥

जे दुःख देहामधून येते आणि इंद्रिये व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते, त्याला तापत्रयात आध्यात्मिक असे म्हणतात. (१४)

देहामधून काये आलें । प्राणें कोण दुःख जालें ।
आतां हें विशद केलें । पाहिजे कीं ॥ १५॥

देहामधून कोणती दुःखे येतात आणि प्राणांमुळे ती कशी सोसावी लागतात, हे आता स्पष्ट करून सांगितले पाहिजे. (१५)

खरुज खवडे पुळिया नारु । नखरुडें मांजया देवि गोवरु ।
देहामधील विकारु । या नांव आध्यात्मिक ॥ १६॥

देहामधील विकारांना आध्यात्मिक ताप म्हणतात. ते असे- खरूज, खवडे, पुळ्या, नारु, नखुर्डे मांजऱ्या, देवी, गोवर (१६)

काखमांजरी केशतोड । वोखटें वर्ण काळफोड ।
व्याधी मूळव्याधी माहाजड । या नांव आध्यात्मिक ॥ १७॥

काखमांजरी, केस्तुड, सडके, व्रण, काळपुळी, व्याधी, दुःसह अशी मूळव्याध. (१७)

अंगुळवेडे गालफुगी । कंड लागे वाउगी ।
हिरडी सुजे भरे बलंगी । या नांव आध्यात्मिक ॥ १८॥

बोटाचे दुखणे, गालफुगी, उगीच कंड सुटणे, हिरडी सुजणे, दातांत भरणारे कस्पट (१८)

वाउगे फोड उठती । कां ते सुजे आंगकांती ।
वात आणी तिडका लागती । या नांव आध्यात्मिक ॥ १९॥

अंगावर उगीच फोड उठणे किंवा अंगाला सूज येणे, वात होणे, तिडका लागणे. (१९)

नाइटे अंदु गजकर्ण । पेहाचे पोट विस्तीर्ण ।
बैसलें टाळें फुटती कर्ण । या नांव आध्यात्मिक ॥ २०॥

नायटे, हाड्यावण, गजकर्ण, जलोदराने वाढलेले पोट कानठळ्या बसून कान फुटणे. (२०)

कुष्ट आणि वोला कुष्ट । पंड्यारोग अतिश्रेष्ठ ।
क्षयरोगाचे कष्ट । या नांव आध्यात्मिक ॥ २१॥

पांढरे कोड, महारोग, अति श्रेष्ठ असा रक्त क्षय व क्षयरोगाचे कष्ट (२१)

वाटी वटक वायेगोळा । हातीं पाईं लागती कळा ।
भोवंडी लागे वेळोवेळां । या नांव आध्यात्मिक ॥ २२॥

गाठ सरकणे, अर्भक दूध प्यायल्यावर दुधाच्या गोळ्या होऊन ते ओकते ते दुखणे किंवा वायुगोळा अथवा हातापायाला कळा लागणे, वरचेवर चक्कर येणे. (२२)

वोलांडा आणी वळ । पोटसुळाची तळमळ ।
आर्धशिसी उठे कपाळ । या नांव आध्यात्मिक ॥ २३॥

वोलांडा, वळ, पोटशूळाच्या वेदना, अर्धशिशीने कपाळ उठणे. (२३)

दुःखे माज आणि मान । पुष्ठी ग्रीवा आणि वदन ।
अस्तिसांदे दुःखती जाण । या नांव आध्यात्मिक ॥ २४॥

मान आणि कंबर दुखणे, पाठ, गळा आणि तोंड दुखणे, हाडांचे सांधे दुखणे. (२४)

कुळिक तरळ कामिणी । मुरमा सुंठरें माळिणी ।
विदेसीं लागलें पाणी । या नांव आध्यात्मिक ॥ २५॥

मोडशी, अजीर्णाची हागओक, कावीळ पुरळ गळवे, गडमाळा, विदेशांतील पाणी लागणे. (२५)

जळसोस आणी हिवारें । गिरीविरी आणी अंधारें ।
ज्वर पाचाव आणी शारें । या नांव आध्यात्मिक ॥ २६॥

कोरड पडणे, हिवताप, गरगरणे आणि अंधारी येणे. उलटलेला ज्वर, ज्वर आणि शहारे येणे. (२६)

शैत्य उष्ण आणी तृषा । क्षुधा निद्रा आणी दिशा ।
विषयतृष्णेची दुर्दशा । या नांव आध्यात्मिक ॥ २७॥

शैत्य, उष्ण, तहान, भूक, निद्रा आणि हगवण, विषयवासनेच्या अतिरेकाने होणारी दुर्दशा. (२७)

आळसी मूर्ख आणी अपेसी । भय उद्भवे मानसीं ।
विसराळु दुश्चित्त आहिर्निशी । या नांव आध्यात्मिक ॥ २८॥

आळशी, मूर्ख, अपयश, मनात भय उत्पन्न होणे. विसराळू असणे आणि रात्रंदिवस उद्विग्न असणे. (२८)

मूत्रकोड आणी परमें । रक्तपिती रक्तपरमें ।
खडाचढाचेनि श्रमे । या नांव आध्यात्मिक ॥ २९॥

लघवी अडणे, परमा, गरमी, रक्तपिती आणि रक्तपरमे, मूतखड्याचा त्रास होणे. (२९)

मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।
येक वेथा असोन न कळे । या नांव आध्यात्मिक ॥ ३०॥

मुरडा, हागवण, उन्हाळे लागणे, अवरोध झाला असता त्रासणे किंवा रोग असून तो कोणता हे न कळणे. (३०)

गांठी ढळली जाले जंत । पडे आंव आणी रक्त ।
अन्न तैसेचि पडत । या नांव आध्यात्मिक ॥ ३१॥

गाठ सरकणे, जंत होणे, आव आणि रक्त पडणे किंवा अन्न न पचता तसेच पडणे. (३१)

पोटफुगी आणी तडस । भरला हिर लागला घांस ।
फोडी लागतां कासावीस । या नांव आध्यात्मिक ॥ ३२॥

पोटफुगी, तडस लागणे, ठसका लागणे, घास लागणे, मुखातील लहान फोडामुळे जीव कासावीस होणे. (३२)

उचकी लागली उसित गेला । पीत उसळलें उलाट झाला ।
खरे पडसा आणी खोंकला । या नांव आध्यात्मिक ॥ ३३॥

उचकी लागणे, घास अडकणे, पित्त उसळून उलटी होणे, जीभकाटे, पडसे, खोकला होणे. (३३)

उसळला दमा आणी धाप । पडजिभ ढासि आणी कफ ।
मोवाज्वर आणी संताप । या नांव आध्यात्मिक ॥ ३४॥

दमा उसळून धाप लागणे, पडजिभेमुळे ढास लागणे, कफ होणे, मोवाज्वर आणि संताप येणे. (३४)

कोणी सेंदूर घातलाअ । तेणें प्राणी निर्बुजला ।
घशामध्ये फोड जाला । या नांव आध्यात्मिक ॥ ३५॥

कोणी शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे. घशामध्ये फोड येणे. (३५)

गळसोट्या आणी जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे ।
दंतहीन लागती किडे । या नांव आध्यात्मिक ॥ ३६॥

घटसर्प आणि जीभ झडणे, तोंडाला सदा दुर्गंधी येणे, दात पडून हिरड्यांना कीड लागणे. (३६)

जरंडी घोलाणा गंडमाळा । अवचिता स्वयें फुटे डोळा ।
आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ॥ ३७॥

पाथरी वाढणे, घोळणा फुटणे, गंडमाळा, अकस्मात डोळा फुटणे, आपलेच बोट आपण कापून घेणे. (३७)

कळा तिडकी लागती । कां ते दंत उन्मळती ।
अधर जिव्हा रगडती । या नांव आध्यात्मिक ॥ ३८॥

कळा व तिडका लागणे, दात उपटले जाणे, दातांनी ओठ किंवा जीभ चावली जाणे. (३८)

कर्णदुःख नेत्र दुःख । नाना दुःखें घडे शोक ।
गर्भांध आणी नपुश्यक । या नांव आध्यात्मिक ॥ ३९॥

कान ठणकणे, डोळे दुखणे, नाना प्रकारच्या दुःखामुळे शोक होणे, गर्भांध किंवा नपुंसक असणे. (३९)

फुलें वडस आणी पडळें । कीड गर्ता रातांधळें ।
दुश्चित्त भ्रमिष्ट आणी खुळें । या नांव आध्यात्मिक ॥ ४०॥

डोळ्यात फूल पडणे, वडस वाढणे, मोतीबिंदू काचबिंदू होणे, पापण्यांना कीड पडणे, डोळे असून न दिसणे, रातांधळेपणा, दुद्धि श्चत्तपणा, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा. (४०)

मुकें बधीर राखोंडें । थोटें चळलें आणी वेडें ।
पांगुळ कुर्हें आणी पावडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४१॥

मुकेपणा, बधिरपणा, ओठ तुटणे, हात तुटणे, वृत्ती चळणे, वेडेपणा, पांगळेपणा, आखूड पाय असणे, कुबड असणे. (४१)

तारसें घुलें काणें कैरें । गारोळें जामुन टाफरें ।
शडांगुळें गेंगाणें विदरें । या नांव आध्यात्मिक ॥ ४२॥

तारवटलेले डोळे असणे, वाकडी मान असणे, तिरळेपणा, घारे डोळे असणे, अति ठेंगणेपणा, सारखे ठेचकाळणे, हाताला सहा बोटे असणे, गेंगणेपणा, कुरूपता. (४२)

दांतिरें बोचिरें घानाळ । घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ ।
अति कृश अति स्थूळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४३॥

दांतरेपणा, बोचरेपणा लांब नाक असणे, नाकच नसणे, कान नसणे, बडबड करणे, अतिकृशता, अतिस्थूलता. (४३)

तोंतरें बोंबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटीळ ।
मत्सरी खादाड तपीळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४४॥

तोतरेपणा, बोबडेपणा, अशक्तपणा, रोगटपणा, कुरूपता, कुटिलता, मत्सरी स्वभाव, खादाडपणा, तापटपणा. (४४)

संतापी अनुतापी मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी ।
पापी अवगुणी विकारी । या नांव आध्यात्मिक ॥ ४५॥

संतापणे, पश्चात्ताप करणे, मत्सर करणे, कामना असणे, हेवा अथवा तिरस्कार करणे, पाप करणे, अवगुण असणे, विकारवशता. (४५)

उठवणें ताठा करक । आवटळे आणी लचक ।
सुजी आणी चालक । या नांव आध्यात्मिक ॥ ४६॥

उठता न येणे, अंग ताठणे, अवघडणे, लचकणे, सूज येणे आणि संधिवात. (४६)

सल आडवें गर्भपात । स्तनगुंते सनपात ।
संसारकोंडे आपमृत्य । या नांव आध्यात्मिक ॥ ४७॥

न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात होणे, स्तनात गाठी होणे, सन्निपात, संसारातील अडचणी, अपमृत्यू (४७)

नखविख आणी हिंगुर्डें । बाष्ट आणी वावडें ।
उगीच दांतखीळ पडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४८॥

नखविष आणि नखुर्डे शिळे व वातुळ खाण्याने होणारे रोग, वावडे खाण्याने होणारा त्रास, उगीच दातखीळ बसणे. (४८)

झडती पातीं सुजती भवया । नेत्रीं होती राझणवडीया ।
चाळसी लागे प्राणियां । या नांव आध्यात्मिक ॥ ४९॥

डोळ्यांच्या पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्याला रांजणवाड्या होणे, डोळ्यांना चष्मा लागणे. (४९)

वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडे मसें ।
चुकुर हो‍इजे मानसें । या नांव आध्यात्मिक ॥ ५०॥

काक्सरपुळ्या, तीळ पांढरेचट्टे काळेचट्टे चामखीळ गालगुंड केसाळ काळे चट्टे मनाने भ्रमिष्ट होणे. (५०)

नाना फुग आणी आवाळें । आंगीं दुर्गंधी प्रबळे ।
चाईचाटी लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ॥ ५१॥

अंगावर येणारे फुगवटे, आवाळे, अंगाला अत्यंत दुर्गंधी येणे, डोक्यावरील केस गळून चट्टे पडणे, तोंडातून लाळ गळणे. (५१)

नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी ।
व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ॥ ५२॥

नाना प्रकारच्या चिंतेने काळवंडणे, नाना दुःखांनी चित्त पोळून निघणे, काही आजार नसून जीवाची तगमग होणे. (५२)

वृद्धपणीच्या आपदा । नाना रोग होती सदा ।
देह क्षीण सर्वदा । या नांव आध्यात्मिक ॥ ५३॥

वृद्धपणाच्या यातना, सदा काही ना काही रोग होणे, देह नेहमी क्षीण असणे. (५३)

नाना व्याधी नाना दुःखें । नाना भोग नाना खांडकें ।
प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ॥ ५४॥

नाना रोग व नाना प्रकारचे दुःख, नाना भोग, अनेक जखमा, यांमुळे माणसाला दुःख होऊन तळमळणे. (५४)

ऐसा आध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप ।
सांगतां सरेना अमूप । दुःखसागर ॥ ५५॥

अशा प्रकारचे आध्यात्मिक ताप हे पूर्वजन्मातील पातकांचे फळ असते. त्यांचे कितीही वर्णन केले तरी पुरे पडत नाही, असा हा न संपणारा दुःखाचा समुद्र आहे. (५५)

बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें ।
पुढें बोलिजे स्वभावें । आदिभूतिक ॥ ५६॥

श्रीसमर्थ म्हणतात की, आणखी किती वर्णन करावे ? श्रोत्यांनी वरील उदाहरणांवरून समजून घ्यावे. आता पुढील समासात स्वाभाविकच आधिभौतिक तापाचे निरूपण केले जाईल. (५६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आध्यात्मिकतापनिरूपणनाम समास सहावा ॥ ६॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘आध्यात्मिकतापनाम’ समास सहावा समाप्त.

समास सातवा : आधिभौतिक ताप

॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । आध्यात्मिकाचें लक्षण ।
आतां आदिभूतिक तो कोण । सांगिजेल ॥ १॥

श्री समर्थ म्हणतात की, मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण वर्णन केले. आता आधिभौतिक ताप कोणता ते सांगितले जाईल. (१)

श्लोक ॥ सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥

अर्थ- सर्व भूतमात्रांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते त्या दुसर्‍या दुःखाला यथार्थ रीतीने आधिभौतिक असे म्हणतात. (१)

सर्व भूतांचेनि संयोगें । सुखदुःख उपजों लागे ।
ताप होतां मन भंगे । या नांव आदिभूतिक ॥ २॥

सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते, त्याने ताप होऊन मन दुःखी होते, त्याला आधिभौतिक असे म्हणतात. (२)

तरी या आदिभूतिकाचें लक्षण । प्रांजळ करूं निरूपण ।
जेणें अनुभवास ये पूर्ण । वोळखी तापत्रयाची ॥ ३॥

तरी आता या आधिभौतिक तापाची लक्षणे स्पष्टपणे वर्णन करू या, म्हणजे त्यायोगे तापत्रयाची चांगली ओळख होऊन अनुभवही येईल. (आधिभौतिक दुःखे पुढीलप्रमाणे) (३)

ठेंचा लागती मोडती कांटे । विझती शस्त्रांचे धायटे ।
सला सिलका आणी सरांटे । या नांव आदिभूतिक ॥ ४॥

ठेच लागणे, पायात काटे मोडणे, शस्त्रांचे घाव लागून जखमा होणे, लाकडाचे बारीक काट्यासारखे कुसळ चुया आणि सराटे इत्यादी घुसणे. (४)

अंग्या आणी काचकुहिरी । आवचटा लागे शरीरीं ।
गांधील ये‍ऊन दंश करी । या नांव आदिभूतिक ॥ ५॥

आग्या वनस्पती शरीरास अकस्मात लागून आग होणे किंवा खाजकुहिरी लागून अंगास खाज सुटणे, गांधीलमाशी येऊन चावणे. (५)

मासी गोमासी मोहळमासी । मुंगी तेलमुंगी डांस दसी ।
सोट जळू लागे यासी । आदिभूतिक बोलिजे ॥ ६॥

माशी, गोमाशी, मोहोळमाशी, मुंगी, तेलमुंगी, डास यांनी दंश करणे किंवा सोट म्हणजे रक्त पिणारा किडा किंवा जळू अंगास चिकटणे. (६)

पिसा पिसोळे चांचण । कुसळें मुंगळे ढेंकुण ।
विसीफ भोवर गोंचिड जाण । या नांव आदिभूतिक ॥ ७॥

पिसवा, पिसोळे, चांचड, कुसळे, मुंगळे, ढेकूण, इसब उत्पन्न करणारे किडे, भुंगे, गोचीड यांचा दंश. (७)

गोंबी विंचु आणी विखार । व्याघ्र लाअंडिगे आणी शूकर ।
गौसायळ सामर । या नांव आदिभूतिक ॥ ८॥

गोम, विंचू आणि साप, वाघ, लांडगे आणि डुक्कर, साळू, सांबर यांचे दंश. (८)

रानगाई रानम्हैसे । रानशकट्ट आणी रीसें ।
रानहाती लांवपिसें । या नांव आदिभूतिक ॥ ९॥

वनगाई, रानम्हशी, रानबैल अस्वले रानहत्ती इत्यादी जनावरांचा मार आणि डाकिणीमुळे लागणारे वेड (९)

सुसरीनें वोढून नेलें । कां तें आवचितें बुडालें ।
आथवा खळाळीं पडिलें । या नांव आदिभूतिक ॥ १०॥

सुसरीने ओढून नेणे किंवा अवचित बुडून मरणे अथवा पाय घसरून प्रवाहात पडणे. (१०)

नाना विखारें आजगर । नाना मगरें जळचर ।
नाना वनचरें अपार । या नांव आदिभूतिक ॥ ११॥

नाना विषारी साप, अथवा अजगर, मगरी वगैरे नाना जलचर प्राणी यांनी ओढून नेणे. अनेक जंगली प्राण्यांपासून दुःख होणे. (११)

अश्व वृषभ आणी खर । स्वान शूकर जंबुक मार्जर ।
ऐसीं बहुविध क्रूर । या नांव आदिभूतिक ॥ १२॥

घोडा, बैल गाढव, कुत्री, डुक्कर कोल्हे, मांजर अशा अनेक कूर पशूमुळे दुःख होणे. (१२)

ऐसीं कर्कशें भयानकें । बहुविध दुःखदायकें ।
दुःखें दारुणें अनेकें । या नांव आदिभूतिक ॥ १३॥

अशी कर्कश, भयानक, नाना प्रकारे दुःख देणारी अनेक दारुण दुःखे. (१३)

भिंती माळवंदे पडती । कडे भुयेरीं कोंसळती ।
वृक्ष आंगावरी मोडती । या नांव आदिभूतिक ॥ १४॥

भिंती आणि गच्च्या कोसळणे, कडे, भुयारे कोसळून अंगावर पडणे किंवा झाडे मोडून अंगावर पडणे. (१४)

कोणी येकाचा श्राप जडे । कोणी येकें केले चेडे ।
आधांतरी होती वेडे । या नांव आदिभूतिक ॥ १५॥

कुणा एकाचा शाप बाधणे, कोणी तरी जादूटोणा करणे, कारण नसताना वेड लागणे. (१५)

कोणी येकें चाळविलें । कोणी येकें भ्रष्टविले ।
कोणी येकें धरून नेलें । या नांव आदिभूतिक ॥ १६॥

कुणीतरी फसविणे, कोणी तरी भ्रष्टविणे, कोणीतरी धरून नेणे. (१६)

कोणी येकें दिलें वीष । कोणी येकें लाविले दोष ।
कोणी येकें घातलें पाश । या नांव आदिभूतिक ॥ १७॥

कुणी तरी विष देणे, कुणी तरी दोषारोप करणे, कुणीतरी फास घालणे. (१७)

अवचिता सेर लागला । नेणो बिबवा चिडला ।
प्राणी धुरें जाजावला । या नांव आदिभूतिक ॥ १८॥

कल्पना नसताना शेराच्या झाडाचा चीक अंगाला लागणे, बिब्बा उतणे किंवा धुराने जीव घाबरा होणे. (१८)

इंगळावरी पाय पडे । शिळेखालें हात सांपडे ।
धावतां आडखुळे पडे । या नांव आदिभूतिक ॥ १९॥

मोठ्या विंचवावर, इंगळीवर पाय पडणे दगडखाली हात सापडणे, धावताना अडखळून पडणे. (१९)

वापी कूप सरोवर । गर्ता कडा नदीतीर ।
आवचितें पडे शरीर । या नांव आदिभूतिक ॥ २०॥

विहिरी, कूप, सरोवर मोठा खड्डा, कडा किंवा नदीतीर या ठिकाणी एकाएकी शरीर पडणे. (२०)

दुर्गाखालें कोंसळती । झाडावरून पडती ।
तेणें दुह्खें आक्रंदती । या नांव आदिभूतिक ॥ २१॥

किल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे आणि त्या दुःखाने आक्रोश करणे. (२१)

सीतें वोठ तरकती । हात पाव टांका फुटती ।
चिखल्या जिव्हाळ्या लागती । या नांव आदिभूतिक ॥ २२॥

थंडीने ओठ फुटणे, हात, पाय, टाचा यांना भेगा पडणे, चिखल्या होणे, जिव्हाळी लागणे. (२२)

अशनपानाचिये वेळे । उष्ण रसें जिव्हा पोळे ।
दांत कस्करे आणी हरळे । या नांव आदिभूतिक ॥ २३॥

खातापिताना उष्ण पदार्थाने जीभ पोळणे, दात करकरणे आणि दातात फटी पडणे. (२३)

पराधेन बाळपणीं । कुशब्दमारजाचणी ।
अन्नवस्त्रेंवीण आळणी । या नांव आदिभूतिक ॥ २४॥

बालपणी पसधीनतेमुळे शिव्यांचा, वाईट शब्दांचा मार सोसावा लागणे, अन्नवस्त्रांची कमतरता असणे. (२४)

सासुरवास गालोरे । ठुणके लासणें चिमोरे ।
आलें रुदन न धरे । या नांव आदिभूतिक ॥ २५॥

मुलींना सासुरवासापायी गालगुच्चे, ठोसे, चिमटे डागणे, इत्यादी जाच सोसताना रडू न आवरणे. (२५)

चुकतां कान पिळिती । कां तो डोळा हिंग घालिती ।
सर्वकाळ धारकीं धरिती । या नांव आदिभूतिक ॥ २६॥

चूक झाली असता कान पिळला जाणे, डोळ्यांत हिंग घालणे, सतत धारेवर धरणे. (२६)

नाना प्रकारीचे मार । दुर्जन मारिती अपार ।
दुरी अंतरे माहेर । या नांव आदिभूतिक ॥ २७॥

दुष्टांनी नाना तर्‍हेने मारहाण करणे, मुलींना माहेर दुरावणे. (२७)

कर्णनासिक विंधिलें । बळेंचि धरून गोंधिलें ।
खोडी जालिया पोळविलें । या नांव आदिभूतिक ॥ २८॥

कानाला, नाकाला भोके पडणे, बळेच धरून गोंदणे, जरा चूक झाली असता आगीचे चटके देणे. (२८)

परचक्रीं धरून नेलें । नीच यातीस दिधलें ।
दुर्दशा हो‍ऊन मेलें । या नांव आदिभूतिक ॥ २९॥

शत्रूचा हल्ला आला असता त्यांनी धरून नेणे, नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे आणि त्यामुळे दुर्दशा होऊन मरण पावणे. (२९)

नाना रोग उद्भवले । जे आध्यात्मिकीं बोलिले ।
वैद्य पंचाक्षरी आणिले । या नांव आदिभूतिक ॥ ३०॥

पूर्वी जे आध्यात्मिक रोग वर्णन केले आहेत, त्यातील अनेक रोग होणे. त्यांच्या उपचारांकरिता वैद्य अथवा मांत्रिक आणणे. (३०)

नाना वेथेचें निर्शन । व्हावया औषध दारुण ।
बळात्कारें देती जाण । या नांव आदिभूतिक ॥ ३१॥

अनेक रोगांचे निरसन करण्यासाठी बळजबरीने दारुण औषधे देणे. (३१)

नाना वल्लीचे रस । काडे गर्गोड कर्कश ।
घेतां होये कासावीस । या नांव आदिभूतिक ॥ ३२॥

नाना वनस्पतींचे रस, काढे, व कडवट चाटणे वगैरे घेताना जीव कासावीस होणे. हे सर्व आधिभौतिक तापच आहेत. (३२)

ढाळ आणी उखाळ देती । पथ्य कठीण सांगती ।
अनुपान चुकतां विपत्ती । या नांव आदिभूतिक ॥ ३३॥

जुलाब आणि वातीचे औषध घ्यावे लागणे, कडक पथ्य करावे लागणे, अनुपानात चूक झाल्याने कष्ट होणे. (३३)

फाड रक्त फांसणी । गुल्लडागांची जाचणी ।
तेणें दुःखें दुःखवे प्राणी । या नांव आदिभूतिक ॥ ३४॥

शरीराची चिरफाड करणे, गाठीवर शस्त्राने चिरा पाडणे व त्यामुळे रक्तस्त्राव होणे, तप्त सळईचे डाग घेणे व त्यायोगे दुःखाने व्याकूळ होणे. (३४)

रुचिक बिबवे घालिती । नाना दुःखें दडपे देती ।
सिरा तोडिती जळा लाविती । या नांव आदिभूतिक ॥ ३५॥

रुईचा चीक अथवा बिय्या घालणे, नाना दुःखाचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे. (३५)

बहु रोग बहु औषधें । सांगतां अपारें अगाधें ।
प्राणी दुखवे तेणें खेदें । या नांव आदिभूतिक ॥ ३६॥

नाना रोग व त्यावर नाना प्रकारची औषधे आणि उपचार आहेत. ते वर्णन करावयाचे ठरवले तर अपार अगाध असल्याने पुरे पडणार नाही. या दुःखांनी अत्यंत दुःख होणे. (३६)

बोलाविला पंचाक्षरी । धूरमार पीडा करी ।
नाना यातना चतुरीं । आदिभूतिक जाणिजे ॥ ३७॥

पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक बोलाविला असता त्याने धुराचा मारा करणे अशा नाना प्रकारच्या यातना आहेत त्या शहाण्यांनी आधिभौतिक म्हणून जाणाव्या. (३७)

दरवडे घालूनियां जना । तश्कर करिती यातना ।
तेणें दुःख होये मना । या नांव आदिभूतिक ॥ ३८॥

चोर दरोडे घालून लोकांना छळतात, त्यामुळे मनाला फार दुःख होणे. (३८)

अग्नीचेनि ज्वाळें पोळे । तेणें दुःखें प्राणी हरंबळे ।
हानी जालियां विवळे । या नांव आदिभूतिक ॥ ३९॥

अग्नीच्या ज्याळांनी होरपळल्यामुळे व्याकूळ होणे, अन्य नुकसान झाले तरी विव्हळणे. (३९)

नाना मंदिरें सुंदरें । नाना रत्नांचीं भांडारें ।
दिव्यांबरें मनोहरें । दग्ध होती ॥ ४०॥

नाना सुंदर मंदिरे अनेक रजांचे साठे, अनेक मनोहर दिव्य वस्त्रे इत्यादी जळणे. (४०)

नाना धान्यें नाना पदार्थ । नाना पशु नाना स्वार्थ ।
नाना पात्रें नाना अर्थ । मनुष्यें भस्म होती ॥ ४१॥

नाना धान्ये, नाना पदार्थ, नाना पशू घरात साठविलेले द्रव्य, भांडी- कुंडी, नाना वस्तू आणि माणसे जळून जाणे. (४१)

आग्न लागला सेती । धान्यें बणव्या आणी खडकुती ।
युक्षदंड जळोन जाती । अकस्मात ॥ ४२॥

शेते, धान्ये, गवताच्या गंजी आणि मळणीनंतर उरलेले कुठार, ऊस वगैरे अकस्मात जळून जाणे. (४२)

ऐसा आग्न लागला । अथवा कोणी लाविला ।
हानी जाली कां पोळला । या नांव आदिभूतिक ॥ ४३॥

अशी आग कोणी लावली किंवा आपोआप लागली तरी त्यामुळे नुकसान होणे किंवा भाजणे. (४३)

ऐसें सांगतां बहुत । होती वन्हीचे आघात ।
तेणे दुःखें दुःखवे चित्त । या नांव आदिभूतिक ॥ ४४॥

अशा अनेक प्रकाशने आगीपासून नुकसान होतच असते, त्या दुःखाने जीव व्याकूळ होणे. (४४)

हारपे विसरे आणी सांडे । नासे गाहाळ फुटे पडे ।
असाध्य होये कोणीकडे । या नांव आदिभूतिक ॥ ४५॥

वस्तू हरवणे, विसरणे किंवा सांडून जाणे, नासून जाणे, गहाळ होणे किंवा पडून फुटणे, परत मिळणे अशक्य होणे. (४५)

प्राणी स्थानभ्रष्ट जालें । नाना पशूतें चुकलें ।
कन्यापुत्र गाहाळले । या नांव आदिभूतिक ॥ ४६॥

माणूस स्थानभ्रष्ट होणे, जनावरे चुकणे, मुली, मुले बेपत्ता होणे. (४६)

तश्कर अथवा दावेदार । आवचितां करिती संव्हार ।
लुटिती घरें नेती खिल्लार । या नांव आदिभूतिक ॥ ४७॥

चोर किंवा शत्रू यांनी अवचित धाड घालून संहार करणे, घरे लुटणे, दुभती जनावरे पळवून नेणे. (४७)

नाना धान्यें केळी कापिती । पानमळां मीठ घालिती ।
ऐसे नाना आघात करिती । या नांव आदिभूतिक ॥ ४८॥

शेतातील उभी पिके, केळी वगैरे कापून नेणे, पानमळ्याचे नुकसान व्हावे म्हणून त्यात मीठ घालणे असे नाना प्रकारचे आघात. (४८)

मैंद उचले खाणोरी । सुवर्णपंथी भुररेकरी ।
ठकु सिंतरु वरपेकरी । वरपा घालिती ॥ ४९॥
गठीछोडे द्रव्य सोडिती । नाना आळंकार काढिती ।
नाना वस्तु मूषक नेती । या नांव आदिभूतिक ॥ ५०॥

पेंढारी, उचलेगिरी करणारे भुरटे चोर, काळीज खाणारे किमयागार, भुलविणारे ठग, लुच्चे, लबाड लोक, लुटारू दरोडेखोर इत्यादींची पीडा. वाटमाऱ्यांनी गाठोडी सोडून द्रव्य व नाना अलंकार पळविणे, उंदरांनी अनेक वस्तू नेणे. (४९-५०)

वीज पडे हिंव पडे । प्राणी प्रजंनी सांपडे ।
कां तो माहापुरीं बुडे । या नांव आदिभूतिक ॥ ५१॥

अंगावर वीज पडणे, अत्यंत थंडी पडणे, मुसळधार पावसात सापडणे, महापुरात वाहून जाणे, बुडणे. (५१)

भोवरें वळणें आणी धार । वोसाणें लाटा अपार ।
वृश्चिक गोंबी आजगर । वाहोन जाती ॥ ५२॥

भोवऱ्यात, वळणात किंवा धारेत सापडणे, पुरात वाहून येणारी लाकडे, अपार लाटा आणि महापुराबरोबर वाहून येणारे अजगर विंचू गोमा इत्यादी प्राण्यांचा त्रास. (५२)

तयामधें प्राणी सांपडला । खडकी बेटीं आडकला ।
बुडत बुडत वांचला । या नांव आदिभूतिक ॥ ५३॥

या सर्वांमध्ये माणूस सापडणे किंवा एखाद्या खडकावर अथवा बेटावर अडकणे, बुडता बुडता वाचणे. (५३)

मनासारिखा नसे संसार । कुरूप कर्कश स्त्री क्रूर ।
विधवा कन्या मूर्ख पुत्र । या नांव आदिभूतिक ॥ ५४॥

कुरूप, कर्कश आणि निर्दय बायको मिळणे, कन्या विधवा होणे आणि पुत्र मूर्ख निपजणे, यांसारख्या कारणांनी प्रपंच मनासारखा न होणे. (५४)

भूत पिशाच्च लागलें । आंगावरून वारें गेलें ।
अबद्धमंत्रे प्राणी चळलें । या नांव आदिभूतिक ॥ ५५॥

भूतपिशाच्च लगणे अंगावरून वारे जाणे चुकलेल्या मंत्रामुळे मनुष्य भ्रमिष्ट होणे. (५५)

ब्राह्मणसमंध शरीरीं । बहुसाल पीडा करी ।
शनेश्वराचा धोका धरी । या नांव आदिभूतिक ॥ ५६॥

ब्राह्मणसंमंधाने देह झपाटून अनेक वर्षे छळणे. शनीची वाईट दशा, साडेसाती वगैरे येणे. (५६)

नाना ग्रहे काळवार । काळतिथी घातचंद्र ।
काळवेळ घातनक्षत्र । या नांव आदिभूतिक ॥ ५७॥

इतर ग्रहांची वाईट दशा येणे. काळ्यार काळतिथी, चंद्राचे घातक योग, काळवेळ आणि घातनक्षत्र यांपासून त्रास. (५७)

सिंक पिंगळा आणी पाली । वोखटें होला काक कलाली ।
चिंता काजळी लागली । या नांव आदिभूतिक ॥ ५८॥

शिंकेचा अपशकुन होणे, पाल चुकचुकणे, पिंगळा होला, कावळा, कलाली इत्यादींनी अपशकुन केल्याने चिंता, काळजी लागणे. (५८)

दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला ।
दुःस्वप्नें जाजावला । या नांव आदिभूतिक ॥ ५९॥

कुडमुड्या जोशी, भविष्य सांगणारा ज्योतिषी यांनी सांगितल्यामुळे काळजी लागणे, वाईट स्वप्ने पडून त्यामुळे भय वाटणे. (५९)

भालु भुंके स्वान रडे । पाली अंगावरी पडे ।
नाना चिन्हें चिंता पवाडे । या नांव आदिभूतिक ॥ ६०॥

कोल्हेकुई, कुत्र्याचे रडणे, पाल अंगावर पडणे, इत्यादी अनेक अपशकुनांच्या योगे मनात चिंता उत्पन होणे. (६०)

बाहेरी निघतां अपशकून । नाना प्रकारें विछिन्न ।
तेणें गुणें भंगे मन । या नांव आदिभूतिक ॥ ६१॥

घराबाहेर पडताना नाना प्रकारे अपशकुन होऊन त्यामुळे मन खिन्न, उदास होणे. (६१)

प्राणी बंदी सांपडला । यातने वरपडा जाला ।
नाना दुःखें दुःखवला । या नांव आदिभूतिक ॥ ६२॥

कैदेत सापडून तेथे अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागणे आणि त्यायोगे नाना प्रकारचे दुःख सोसावे लागणे. (६२)

प्राणी राजदंड पावत । जेरबंद चाबुक वेत ।
दरेमार तळवेमार होत । या नांव आदिभूतिक ॥ ६३॥

राजाकडून दंड किंवा शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक, वेताची छडी यांनी मारणे, दरीत लोटून मारणे किंवा तापलेल्या तव्यावर उभे करून मारणे. (६३)

कोरडे पारंब्या फोक । बहुप्रकारें अनेक ।
बहुताडिती आदिभूतिक । या नांव बोलिजे ॥ ६४॥

चामड्याचा चाबूक, झाडाच्या पारंब्या आणि फोक म्हणजे झाडाची सालपटे अशी मारण्याची अनेक साधने वापरून दिलेला खूप मार सोसणे. (६४)

मोघरीमार बुधलेमार । चौखुरून डंगारणेमार ।
बुक्या गचांड्या गुढघेमार । या नांव आदिभूतिक ॥ ६५॥

गुदद्वारी मेख मारणे, दारूच्या बुधल्यास बांधून आग लावून देणे. चारी बाजूंनी ताणून धरून बडग्यांनी मारणे, बुक्क्या मारणे, गचांड्या मारणे गुडघ्यावर मारणे. (६५)

लाता तपराखा सेणमार । कानखडे दगडमार ।
नाना प्रकारींचे मार । या नांव आदिभूतिक ॥ ६६॥

लाथा मारणे, चपराका मारणे, शेणमारा करणे, कानात खडे खुपसणे, दगडांनी मारणे, अशा नाना प्रकारांनी मारणे. (६६)

टांगणें टिपया पिछोडे । बेडी बुधनाल कोलदंडे ।
रक्षणनिग्रह चहूंकडे । या नांव आदिभूतिक ॥ ६७॥

टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात खेचून मागे बांधणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्याशी नालाकृती बांधून मारणे, कोलदांडे घालणे, इकडे तिकडे जराही हलू न देणे. (६७)

नाकवणी चुनवणी । मीठवणी रायवणी ।
गुळवण्याची जाचणी । या नांव आदिभूतिक ॥ ६८॥

नाकात तीक्ष्ण पदार्थ ओतणे किंवा चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकात, कानात वा घशात ओतल्याने यातना होणे. (६८)

जळामध्यें बुचकळिती । हस्तीपुढें बांधोन टाकिती ।
हाकिती छळिती यातायाती । या नांव आदिभूतिक ॥ ६९॥

पाण्यात बुचकळणे, हात पाय बांधून हत्तीपुढे टाकणे, गुरांप्रमाणे हाकणे, छळणे, उगाच कष्ट देणे. (६९)

कर्णछेद घ्राणछेद । हस्तछेद पादछेद ।
जिव्हाछेद अधरछेद । या नांव आदिभूतिक ॥ ७०॥

कान कापणे, नाक कापणे, हात, पाय तोडणे, जीभ कापणे, ओठ कापणे. (७०)

तीरमार सुळीं देती । नेत्र वृषण काढिती ।
नखोनखीं सुया मारिती । या नांव आदिभूतिक ॥ ७१

बाणांनी मारणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, नखांत सुया मारणे. (७१)

पारड्यामध्यें घालणें । कां कडेलोट करणें ।
कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक ॥ ७२॥

पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे किंवा तोफेच्या तोंडी उडविणे. (७२)

कानीं खुंटा आदळिती । अपानीं मेखा मारिती ।
खाल काढून टाकिती । या नांव आदिभूतिक ॥ ७३॥

कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारी मेख मारणे, नखशिखांत अंगाचे कातडे सोलणे. (७३)

भोत आणी बोटबोटी । अथवा गळ घालणें कंठीं ।
सांडस लावून आटाटी । या नांव आदिभूतिक ॥ ७४॥

पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून मारणे, अथवा गळ्याला गळ टोचणे, तापलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे. (७४)

सिसें पाजणें वीष देणें । अथवा सिरछेद करणें ।
कां पायातळीं घालणें । या नांव आदिभूतिक ॥ ७५॥

उकळत्या शिशाचा रस पाजणे, विष देणे, शिरच्छेद करणे किंवा अंगावर माणसे नाचवून पायदळी तुडवून मारणे हे सर्व शिक्षेचे प्रकार (७५)

सरड मांजरें भरिती । अथवा फांसीं ने‍ऊन देती ।
नानापरी पीडा करिती । या नांव आदिभूतिक ॥ ७६॥

अंगावरील कपड्यात सरडे इत्यादी भरणे, बंद खोलीत पिसाळलेले मांजर अंगावर सोडणे, अथवा फाशी देणे, अशा नाना प्रकारांनी पीडा करणे. (७६)

स्वानप्रळये व्याघ्रप्रळये । भूतप्रळये सुसरीप्रळये ।
शस्त्रप्रळये विझप्रळये । या नांव आदिभूतिक ॥ ७७॥

कुत्री, वाघ, भुतेखेते, सुसरी, नाना शस्त्रे, अंगावर वीज पडणे वगैरेंचा अतिरेक होणे व त्यामुळे मरण ओढवणे. (७७)

सीरा वोढून घेती । टेंभें ला‍उन भाजिती ।
ऐशा नाना विपत्ती । या नांव आदिभूतिक ॥ ७८॥

अंगातील शिरा तोडणे, टेंभे लावून त्यांनी अंगाला चटके देणे. अशा नाना विपत्ती. (७८)

मनुष्यहानी वित्तहानी । वैभवहानी महत्वहानी ।
पशुहानी पदार्थहानी । या नांव आदिभूतिक ॥ ७९॥

जवळची माणसे मरणे, वित्तहानी, वैभव नाहीसे होणे, मानसन्मान यांची हानी, जनावरे मरणे, इतर चीजवस्तू नाहीशी होणे. (७९)

बाळपणीं मरे माता । तारुण्यपणीं मरे कांता ।
वृद्धपणीं मृत्य सुता । या नांव आदिभूतिक ॥ ८०॥

बालपणात आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे. (८०)

दुःख दारिद्र आणी रुण । विदेशपळणी नागवण ।
आपदा अनुपत्ति कदान्न । या नांव आदिभूतिक ॥ ८१॥

दुःख, दारिद्रय, कर्ज, परदेशी पळून जावे लागणे, लूट होऊन सर्वस्वास मुकणे, संकटे येणे, आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासणे, कदन्न खायची वेळ येणे. (८१)

आकांत वाखाप्रळये । युद्ध्य होतां पराजये ।
जिवलगांचा होये क्षये । या नांव आदिभूतिक ॥ ८२॥

महामारीने हजारो माणसे मरणे व त्यामुळे हाहाकार माजणे, युद्धात पराजय होणे, जिवलग माणसे मृत्यू पावणे. (८२)

कठीण काळ आणी दुष्काळ । साशंक आणी वोखटी वेळ ।
उद्वेग चिंतेचे हळाळ । या नांव आदिभूतिक ॥ ८३॥

आधीच कठीण काळ असता त्यात दुष्काळ पडणे, मनात धास्तावलेला असता वाईट वेळ येणे, उद्वेग आणि चिंता यांमुळे हालहाल होणे. (८३)

घाणा चरखीं सिरकला । चाकाखालें सांपडला ।
नाना वन्हींत पडिला । या नांव आदिभूतिक ॥ ८४॥

घाण्यात किंवा चरकात सापडून चाकाखाली येणे, नाना प्रकारच्या आगीत सापडणे. (८४)

नाना शस्त्रें भेदिला । नाना स्वापदीं भक्षिला ।
नाना बंदीं पडिला । या नांव आदिभूतिक ॥ ८५॥

नाना शस्त्रांनी जखमा होणे. नाना श्वापदांनी खाणे, अनेक लोकांच्या कैदेत पडणे. (८५)

नाना कुवासें निर्बुजे । नाना अपमानें लाजे ।
नाना शोकें प्राणी झिजे । या नांव आदिभूतिक ॥ ८६॥

नाना प्रकारच्या वाईट स्थळी राहावे लागल्याने श्वास कोंडणे, नाना प्रकारे अपमान झाल्याने लाज वाटणे, नाना प्रकारच्या शोकांनी खंगून जाणे, या सर्वांस आधिभौतिक तापच म्हणतात. (८६)

ऐसें सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर ।
श्रोतीं जाणावा विचार । आदिभूतिकाचा ॥ ८७॥

याप्रकारे आधिभौतिक ताप म्हणजे दुःखाचे डोंगरच असून ते अपार आहेत. येथे जे सांगितले आहेत, त्यावरून श्रोत्यांनी आधिभौतिक तापाच्या स्वरूपासंबंधी विचार जाणून घ्यावा, असे समर्थ म्हणतात. (८७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आदिभौतिकतापनिरूपणनाम समास सातवा ॥ ७॥

इति श्रीदासबोधे गुरूशिव्यसंवादे ‘आदिभौतिकतापनाम’ समास सातवा समाप्त.

समास आठवा : आधिदैविक ताप

॥ श्रीराम ॥

मागां बोलिला आध्यात्मिक । त्याउपरीं आदिभूतिक ।
आतां बोलिजेल आदिदैविक । तो सावध ऐका ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, प्रथम आध्यात्मिक तापाचे निरूपण केले. त्यानंतर आधिभौतिक तापाचे वर्णन केले. आता आधिदैविक तापासंबंधी जे सांगतो, ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. (१)

श्लोक: शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥

श्लोक अर्थ- आपल्या चांगल्या-वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग नरकादींचे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक म्हणतात. (१)

शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं येमयातना ।
स्वर्ग नर्क भोग नाना । या नांव आधिदैविक ॥ २॥

लोकांना त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्माच्या योगे मरणानंतर यमयातना अथवा स्वर्ग किंवा नरकादी नाना भोग भोगावे लागतात, त्यांना आधिदैविक असे म्हणतात. (२)

नाना दोष नाना पातकें । मदांधपणें अविवेकें ।
केलीं, परी तें दुःखदायकें । येमयातना भोगविती ॥ ३॥

माणूस जिवंत असता मदांधपणाने किंवा अविचाराने नाना दोष, नाना पातके करतो, त्या वेळी त्याला काही वाटत नाही. पण त्यामुळेच त्याला दुःखदायक अशा यमयातना भोगाव्या लागतात. (३)

आंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें ।
नाना सामर्थ्याचेनि बळें । अकृत्य करिती ॥ ४॥

शारीरिक बळाने, द्रव्यबळाने, मनुष्यबळाने, राजबळाने किंवा इतर नाना शक्तींच्या बळाने मनुष्य जे करू नये, तेच कुकर्म करतो. (४)

नीती सांडूनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां ।
येमयातना भोगितां । जीव जाये ॥ ५॥

याप्रमाणे नीती सोडून वास्तविक जे करू नये, ते कृत्य केल्याने नंतर जेव्हा यमयातना भोगाव्या लागतात, तेव्हा जीव कासावीस होतो. (५)

डोळे झांकून स्वार्थबुद्धीं । नाना अभिळाश कुबुद्धीं ।
वृत्ति भूमिसिमा सांधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६॥

मनुष्य अति स्वार्थबुद्धीने अंध बनून, कुबुद्धी व अतिलोभ यांमुळे अनेक दुष्कृत्ये करतो. आपल्या निर्वाहाचे साधन असलेली जी जमीन त्याला मिळालेली असते तिची हद्द वाढविणे, दुसऱ्याचे द्रव्य, बायको व इतर चीजवस्तू पळविणे. (६)

मातलेपणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात ।
अप्रमाण क्रिया करीत । म्हणौन येमयातना ॥ ७॥

अत्यंत माज चढल्याप्रमाणे उन्मत्तपणे वागणे, जीवघात, कुटुंबघात करणे इत्यादी अनुचित कृत्ये केल्याने त्याला यमयातना भोगाव्या लागतात. (७)

मर्यादा सांडूनि चालती । ग्रामा दंडी ग्रामाधिपती ।
देशा दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ ८॥

नीतिन्यायाची चाड न धरता मर्यादा सोडून वागले असता ग्रामाधिपती गावाला दंड करतो. देशाधिपती देशाला दंड करतो. (८)

देशाधिपतीस दंडिता रावो । रायास दंडिता देवो ।
राजा न करितां नीतिन्यावो । म्हणौन यमयातना ॥ ९॥

देशाधिपती जरनीतिन्याय-मर्यादा सोडून वागू लागला, तर त्याला राजा दंड करतो. राजा अयोग्य वागला तर त्याला देव दंड करतो. गजाने जर नीतिन्याय सोडला तर त्यालाही यमयातना भोगाव्या लागतात. (९)

अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी हो‍ऊन राहे ।
राज्याअंतीं नर्क आहे । म्हणौनियां ॥ १०॥

स्वार्थाने, अनीतीने वागल्यास राजालाही पाप लागते व यज्याअती नरकात जावे लागते. (१०)

राजा सांडितां राजनीति । तयास येम गांजिती ।
येम नीति सांडितां धावती । देवगण ॥ ११॥

राजाने राजनीति सोडली तर त्यास यम शासन करतो आणि यमाने नीती सोडली तर देवगण धावून येतो व त्याला शासन करतो. (११)

ऐसी मर्यादा लाविली देवें । म्हणौनि नीतीनें वर्तावें ।
नीति न्याय सांडितां भोगावें । येमयातनेसी ॥ १२॥

भगवंताने अशी मर्यादा घालून दिलेली आहे, म्हणून सदैव नीतीने वागावे. नीतिन्याय सोडून वर्तन केल्यास यमयातना भोगाव्या लागतात. (१२)

देवें प्रेरिले येम । म्हणौनि आदिदैविक नाम ।
तृतीय ताप दुर्गम । येमयातनेचा ॥ १३॥

देव यमास प्रेरणा देऊन त्याच्याद्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो, म्हणून त्यांना आधिदैविक म्हणतात. हा यमयातनेचा तृतीय ताप अत्यंत दुर्गम आहे. (१३)

येमदंड येमयातना । शास्त्रीं बोलिले प्रकार नाना ।
तो भोग कदापि चुकेना । या नांव आदिदैविक ॥ १४॥

शास्त्रांमध्ये यमदंड आणि यमयातना यांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. तो भोग कधीही चुकवता येत नाही. त्याला आधिदैविक म्हणतात. (१४)

येमयातनेचे खेद । शास्त्रीं बोलिले विशद ।
शेरीरीं घालून, अप्रमाद- । नाना प्रकारें ॥ १५॥

माणूस जी नाना प्रकारची पापे करतो, त्याचे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठवले जातात. त्या दोषास अनुसरून त्याचा स्थूल देह पडल्यावर त्याला नाना प्रकारच्या यमयातना सोसाव्या लागतात. त्यांचे अनेक प्रकार असून त्यांचे शास्त्रांत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. (१५)

पापपुण्याचीं शरीरे । स्वर्गीं असती कळिवरें ।
त्यांत घालून नाना प्रकारें । पापपुण्य भोगविती ॥ १६॥

मरणोत्तर लोकात ह्या स्थूल देहापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी पाप-पुण्याची शरीरे असतात. त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार ती शरीरे धारण करतो व त्या प्रमाणे नाना प्रकारचे भोग भोगतो. (१६)

नाना पुण्यें विळास । नाना दोषें यातना कर्कश ।
शास्त्रीं बोलिलें अविश्वास- । मानूंच नये ॥ १७॥

त्याने पुष्कळ पुण्य केले असेल तर त्याला स्वर्गात नाना प्रकारचे विलासाचे सुख प्राप्त होते व नाना दोष, पातके केली असतील, तर कठोर यातना सोसाव्या लागतात, असे शास्त्र सांगते. त्या शास्त्रावर अविश्वास कधीही नसावा. (१७)

वेदाज्ञेनें न चालती । हरिभक्ती न करिती ।
त्यास येमयातना करिती । या नांव आदिदैविक ॥ १८॥

जे वेदाज्ञेचे पालन करीत नाहीत, हरिभक्तीही करीत नाहीत, त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. (१८)

अक्षोभ नर्कीं उदंड जीव । जुनाट किडे करिती रवरव ।
बांधोन टाकिती हातपाव । या नांव आदिदैविक ॥ १९॥

अक्षोभ नावाचा नरक आहे, त्यात असंख्य जुने किडे वळवळ करीत असतात, पापी जीवास हातपाय बांधून त्या नरकात टाकून देतात. (१९)

उदंड पैस लाहान मुख । कुंभाकार कुंड येक ।
दुर्गंधी उकाडा कुंभपाक । । या नांव आदिदैविक ॥ २०॥

काही पापी जीवांना कुंभपाक नावाच्या नरकात टाकतात. कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे आत उदंड जागा असलेले कुंभाच्या आकाराचे एक कुंड असते, त्यात अत्यंत दुर्गंधी व उकाडा असतो. (२०)

तप्तभूमिका ताविती । जळत स्थंभ पोटाळविती ।
नाना सांडस लाविती । या नांव आदिदैविक ॥ २१॥

काही पापी जीवांना तापलेल्या भूमीवर भाजतात, काहींच्या पोटावरून जळत असलेला खांब फिरवितात किंवा शरीरास अनेक प्रकारचे चाप लावतात. (२१)

येमदंडाचे उदंड मार । यातनेची सामग्री अपार ।
भोग भोगिती पाअपी नर । या नांव आदिदैविक ॥ २२॥

यमदंडाच्या मागचे अनेक प्रकार आहेत. यातनेची साधने अपार आहेत. पापी लोकांना त्याच्या यातना भोगाव्या लागतात. (२२)

पृथ्वीमध्यें मार नाना । त्याहून कठीण येमयातना ।
मरितां उसंतचि असेना । या नांव आदिदैविक ॥ २३॥

पृथ्वीवर माराचे नाना प्रकार असले तरी यमयातना त्याहून फारच कठीण असतात. तेथील यातना थांबतच नाहीत. (२३)

चौघे चौंकडे वोढिती । येक ते झोंकून पाडिती ।
ताणिती मारिती वोढूनि नेती । या नांव आदिदैविक ॥ २४॥

चारजण चहूंकडे ओढतात, कुणी झोके देऊन पाडतात, तर कुणी ताणून धरतात. कुणी मारतात तर कुणी ओढून फरफटत नेतात. (२४)

उठवेना बसवेना । रडवेना पडवेना ।
यातनेवरी यातना । या नांव आदिदैविक ॥ २५॥

त्या प्राण्याची उठवेना, बसवेना, रडता येईना, पडता येईना, यातनेवर यातना चालूच आहेत, अशी स्थिती होते. (२५)

आक्रंदे रडे आणि फुंजे । धकाधकीनें निर्बुजे ।
झुर्झरों पंजर हो‍ऊन झिजे । या नांव आदिदैविक ॥ २६॥

जीव तेथे आक्रोश करतो, रडतो, गहिवरतो, फुसफुसतो, तेथील धक्काबुक्कीने कासावीस होतो, सारखी झुरणी लागल्याने झिजून केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो. (२६)

कर्कश वचनें कर्कश मार । यातनेचे नाना प्रकार ।
त्रास पावती दोषी नर । या नांव आदिदैविक ॥ २७॥

कर्कश बोलणे ऐकून घ्यावे लागते, असह्य मार, अनेक प्रकारच्या यातना, यांमुळे दोषी लोकांना फार त्रास भोगावा लागतो. (२७)

मागां बोलिलां राजदंड । त्याहून येमदंड उदंड ।
तेथील यातना प्रचंड । भीमरूप दारुण ॥ २८॥

पूर्वी राजदंडाचे वर्णन केले आहे, पण त्याहूनही हा यमदंड फार भयंकर असतो. तेथील यातना फार मोठ्या अत्यंत दारुण व प्रचंड असतात. (२८)

आध्यात्मिक आदिभूतिक । त्याहूनि विशेष आदिदैविक ।
अल्प संकेतें कांहींयेक । कळावया बोलिलें ॥२९॥

श्रीसमर्थ म्हणतात की, प्रथम आध्यात्मिक आधिभौतिक तापाचे वर्णन केले. पण त्याहूनही आधिदैविक ताप फारच वेगळा व असह्य असतो. त्याची थोडी तरी कल्पना यावी म्हणून काही थोडीशी लक्षणे येथे सांगितली आहेत. (२९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिदैविकतापनिरूपणनाम
समास आठवा ॥ ८॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आदिदैविकतापनाम’ समास आठवा समाप्त.

समास नववा : मृत्युनिरूपण

॥ श्रीराम ॥

संसार म्हणिजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार ।
मापीं लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, संसार म्हणजे स्वतःच स्वार होणे, म्हणजे जीव स्वतः सच्चिदानंदस्वरूप असून त्याचे विस्मरण झाल्याने तो स्वतःला देह मानून बळेच या जन्म-मरणाच्या चक्रात सापडतो. एकदा यात जन्म घेतला की, मरण चुकत नाही. मरणाची घटना उधार नाही. आजची उद्यावर कुणीच ढकलू शकत नाही. माणसाच्या शरीराला क्षणाक्षणाचे माप लागलेले आहे. क्षणाक्षणाने तो मृत्यूच्या निकट जात असतो. (१)

नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती ।
कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ॥ २॥

जन्माला आल्यापासून काळ नेहमी बरोबरच असतो. पुढे काय होणार आहे, हे कुणीच सांगू शकत नाही, कुणालाच ते कळत नाही. ज्याचे जसे कर्म असेल, त्याप्रमाणे माणूस देशात अथवा परदेशात मृत्यू पावतो. (२)

सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ॥ ३॥

पूर्वसंचित पूर्णपणे संपताच एक क्षणभराचाही अवकाश मिळत नाही. अखेरची वेळ आली की निमिष भरते न भरते तोच देह सोडून जावेच लागते. (३)

अवचितें काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें ।
ने‍ऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥ ४॥

अचानक काळाचे दूत येऊन एकदम जीवाला मारत सुटतात आणि पुढे घालून मृत्युपंथाने घेऊन जातात. (४)

होतां मृत्याची आटाटी । कोणी घालूं न सकती पाठीं ।
सर्वत्रांस कुटाकुटी । मागेंपुढें होतसे ॥ ५॥

एकदा मृत्यूची धाड पडली की, कोणी पाठीशी घालू शकत नाही. सर्वांनाच काळ कुटून टाकतो. त्यात कुणाला लवकर मरण येते तर कुणाला उशिरा. (५)

मृत्युकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं ।
माहाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥ ६॥

मृत्युकाळ म्हणजे जणू भरभक्कम काठीच आहे. कितीही बलवान माणूस असला तरी त्याच्या मस्तकावरही तिचा प्रहार होतोच. अत्यंत बलाढ्य राजेरजवाडेही तिच्यापुढे टिकू शकत नाहीत. (६)

मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा जुंझार ।
मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरांगणीं ॥ ७॥

मृत्यू असे म्हणत नाही की, हा क्रूर आहे, हा झुंजार आहे किंवा हा समरांगणी संग्रामशूर आहे, (७)

मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी ।
मृत्य न म्हणे उग्ररूपी । माहांखळ ॥ ८॥

किंवा हा कोपी आहे, हा प्रतापी आहे, हा महादुष्ट असून अत्यंत उग्र स्वरूपाचा आहे, (८)

मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य ।
मृत्य न म्हणे आढ्य । सर्व गुणें ॥ ९॥

किंवा हा बलाढ्य आहे, हा धनाढ्य आहे किंवा हा सर्वगुणसंपन्न आहे, (९)

मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे हा श्रीमंत ।
मृत्य न म्हणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १०॥

हा प्रसिद्ध आहे, हा श्रीमंत आहे व हा अद्‌भुत पराक्रमी आहे, (१०)

मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥

किंवा हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा तंत्रमंत्र प्रयोग जाणणारा करामती आहे, (११)

मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥

हा अश्वांचा धनी आहे, हा गजपती आहे किंवा हा अत्यंत विख्यात राजा आहे. (१२)

मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥ १३॥

किंवा हा लोकांत श्रेष्ठ आहे किंवा हा राजकारणी आहे किंवा हा वेतन घेणारा किंवा अनेकांना वेतन देणारा मालक आहे. (१३)

मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई ।
मृत्य न म्हणे ठाई ठाई । पुंड राजे ॥ १४॥

हा देसाई आहे किंवा हा व्यवसायी आहे किंवा ठिकठिकाणचे पुंड राजे आहेत, (१४)

मृत्य न म्हणे मुद्राधारी । मृत्य न म्हणे व्यापारी ।
मृत्य न म्हणे परनारी । राजकन्या ॥ १५॥

हा राजमुद्रा धारण करणारा आहे, हा व्यापारी आहे, ही परदारा आहे किंवा ही राजकन्या आहे, (१५)

मृत्य न म्हणे कार्याकारण । मृत्य न म्हणे वर्णावर्ण ।
मृत्य न म्हणे हा ब्राह्मण । कर्मनिष्ठ ॥ १६॥

हे कार्य आहे, हे कारण आहे, हा उच्चवर्णीय आहे किंवा हा नीचवर्णाचा आहे किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, (१६)

मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न ।
मृत्य न म्हणे विद्वज्जन । समुदाई ॥ १७॥

हा व्युत्पन्न आहे, हा संपन्न आहे किंवा सभेतील हे मोठे विद्वान पंडित आहेत, (१७)

मृत्य न म्हणे हा धूर्त । मृत्य न म्हणे बहुश्रुत ।
मृत्य न म्हणे हा पंडित । माहाभला ॥ १८॥

हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, हा मोठा सज्जन असून पंडित आहे, (१८)

मृत्य न म्हणे पुराणिक । मृत्य न म्हणे हा वैदिक ।
मृत्य न म्हणे हा याज्ञिक । अथवा जोसी ॥ १९॥

हा पुराणिक आहे, हा वैदिक आहे, हा याज्ञिक आहे आणि हा जोशी किंवा ज्योतिषी आहे. (१९)

मृत्य न म्हणे अग्निहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री ।
मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ॥ २०॥

हा अग्निहोत्री आहे, हा श्रौतशास्त्रवेत्ता याज्ञिक आहे किंवा हा पूर्णपणे तंत्रमंत्रशास्त्र जाणणारा आहे, (२०)

मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ ।
मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥ २१॥

हा शास्त्रज्ञ आहे, हा वेदज्ञ आहे, हा सर्वज्ञ असून सर्व जाणतो, (२१)

मृत्य न म्हणे ब्रह्मत्या । मृत्य न म्हणे गोहत्या ।
मृत्य न म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ॥ २२॥

हा ब्रह्महत्या करणारा आहे, हा गोहत्या करणारा आहे किंवा स्त्री, बाल इत्यादींची हत्या करणात आहे. (२२)

मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी ।
मृत्य न म्हणे तत्वज्ञानी । तत्ववेत्ता ॥ २३॥

हा रागज्ञानी आहे, हा तालज्ञानी आहे किंवा हा तत्त्व जाणारा तत्त्वज्ञानी आहे, (२३)

मृत्य न म्हणे योग्याभ्यासी । मृत्य न म्हणे संन्यासी ।
मृत्य न म्हणे काळासी । वंचूं जाणे ॥ २४॥

हा योगाभ्यासी आहे, हा संन्यासी आहे. हा काळाला फसवू शकेल असा योगी आहे, (२४)

मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध ।
मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५॥

हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य आहे किंवा हा पंचाक्षरी आहे, (२५)

मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी ।
मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन । २६॥

हा गोसावी आहे, हा तपस्वी आहे किंवा हा मनोजयी असून विरक्त आहे, (२६)

मृत्य न म्हणे ऋषेश्वर । मृत्य न म्हणे कवेश्वर ।
मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥ २७॥

हा ऋषीश्वर आहे, हा कवीश्वर आहे, हा दिगंबर आहे, हा समाधिस्थ आहे, (२७)

मृत्य न म्हणे हठयोगी । मृत्य न म्हणे राजयोगी ।
मृत्य न म्हणे वीतरागी । निरंतर ॥ २८॥

हा हठयोगी आहे, हा राजयोगी आहे किंवा हा निरंतर विरक्त आहे, (२८)

मृत्य न म्हणे ब्रह्मच्यारी । मृत्य न म्हणे जटाधारी ।
मृत्य न म्हणे निराहारी । योगेश्वर ॥ २९॥

हा ब्रह्मचारी आहे, हा जलधारी आहे, हा निराहारी योगेश्वर आहे, (२९)

मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत ।
मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३०॥

हा संत आहे, हा महंत आहे, हा हवे तेव्हा गुप्त होणारा आहे, (३०)

मृत्य न म्हणे हा स्वाधेन । मृत्य न म्हणे हा पराधेन ।
सकळ जीवांस प्राशन । मृत्युचि करी ॥ ३१॥

हा स्वाधीन आहे, हा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यूच खाऊन टाकतो. (३१)

येक मृत्युमार्गी लागले । येकीं आर्धपंथ क्रमिले ।
येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२॥

काही जीव जन्मतःच मरतात, काही अर्धे आयुष्य जगून मरतात तर काही वृद्धपणी मरतात. (३२)

मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण ।
मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ॥ ३३॥

मृत्यू हा विचारच करीत नाही की, हा बाल आहे, हा तरुण आहे, हा सुलक्षण आहे किंवा हा खूप बोलका आहे की, हा चतुर शहाणा आहे. (३३)

मृत्य न म्हणे हा आधारु । मृत्य न म्हणे उदार ।
मृत्य न म्हणे हा सुंदर । चतुरांग जाणे ॥ ३४॥

हा अनेकांचा आधार आहे किंवा हा उदार आहे, हा सुंदर असून चतुरस्त्र आहे, (३४)

मृत्य न म्हणे पुण्यपुरुष । मृत्य न म्हणे हरिदास ।
मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ॥ ३५॥

हा पुण्यपुरुष आहे, हा हरिदास आहे किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे. (३५)

आतां असो हें बोलणें । मृत्यापासून सुटिजे कोणें ।
मागेंपुढें विश्वास जाणें । मृत्युपंथें ॥ ३६॥

आता हे बोलणे पुरे झाले. मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही. प्रत्येक जीवास लवकर अगर उशिरा पण निश्चितपणे मृत्युपंथानेच जावे लागते. (३६)

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौयासी लक्ष जीवयोनी ।
जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७॥

सृष्टीत असणाऱ्या जरायुज, अंडज, स्वेदज व उद्‌भिज्ज या चार प्रकारच्या प्राण्यांना परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार प्रकारच्या वाणींना, चौऱ्यांशी लक्ष जीवयोनींना म्हणजेच जे जे जन्मास येतात त्या सर्व प्राण्यांना मृत्यू चुकत नाही. (३७)

मृत्याभेणें पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा ।
मृत्यास न ये चुकवितां । कांहीं केल्या ॥ ३८॥

मृत्यूला भिऊन पळून जावे म्हटले तरी मृत्यू सर्वथा सोडतच नाही. काहीही केले तरी मृत्यूला चुकविता येतच नाही. (३८)

मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी ।
मृत्य न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९॥

हा माणूस स्वदेशातील आहे की विदेशातील आहे किंवा हा निरंतर उपवास करणारा आहे, याचा विचार मृत्यू करीत नाही. (३९)

मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर ।
मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४०॥

माणूस अत्यंत थोर असला, प्रत्यक्ष हरिहर असले किंवा भगवंताचे अवतार जरी असले तरी मृत्यू त्यांना जुमानीत नाही. (४०)

श्रोतीं कोप न करावा । हा मृत्यलोक सकळांस ठावा ।
उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्यपंथें ॥ ४१॥

हे सर्व ऐकून श्रोत्यांनी राग मागू नये. हा मृत्युलोक आहे हे सर्वजण जाणतातच. जो जन्माला येतो, तो प्राणी मृत्यूच्या मार्गाने जातो हे ठरलेलेच आहे. (४१)

येथें न मनावा किंत । हा मृत्यलोक विख्यात ।
प्रगट जाणती समस्त । लहान थोर ॥ ४२॥

या बाबतीत संशय घेणे योग्य नव्हे. कारण लहान- थोर सर्वांनाच हे स्पष्ट माहीत आहे. (४२)

तथापी किंत मानिजेल । तरी हा मृत्यलोक नव्हेल ।
याकारणें नासेल । उपजला प्राणी ॥ ४३॥

जरी संशय घेतला, तरी हा मृत्युलोक नाही, असे होणार आहे का ? म्हणून येथे जन्मलेला प्रत्येकजण मरणारच. (४३)

ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें ।
जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥ ४४॥

तरी हे जाणून घेऊन प्रत्येक जीवाने आपल्या आयुष्याचे सार्थकच करावे. मृत्यूने देह नष्ट झाला तरी या लोकात त्याने कीर्तिरूपाने उरावे. (४४)

येरवीं प्राणी लहान थोर । मृत्य पावती हा निर्धार ।
बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंची नये ॥ ४५॥

नाहीतर जे लहान- थोर प्राणी या जगात येतात, ते सर्व मृत्यू पावतात हे अगदी निश्चितच आहे. म्हणून आत्तापर्यंत जे काही सांगितले, ते खोटे मानूच नये. (४५)

गेले वहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे ।
गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथें ॥ ४६॥

अत्यंत वैभवसंपन्न, दीर्घायुषी, ज्यांचा महिमा अगाध होता, असे सर्व शेवटी मृत्युपंथानेच गेले. (४६)

गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी ।
गेले बहुत संग्रामी । संग्रामसौरे ॥ ४७॥

अत्यंत पराक्रमी, अत्यंत कपटी, संग्रामशूर असे अनेक रणांगणांवर संग्राम करीत असतानाच गेले. (४७)

गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळांचे ।
गेले बहुतां कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८॥

अत्यंत बलवान असलेले अत्यंत दीर्घायुषी, अनेक कुलेत अनेक कुळातील प्रसिद्ध राजे सगळे गेले. (४८)

गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक ।
गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९॥

अनेक लोकांचे पालनपोषण करणारे अनेकांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे मोठ्या युक्तीने तर्क करणारे तर्कवादी सगळे गेले (४९)

गेले विद्येचे सागर । गेले बळाचे डोंघर ।
गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथे ॥ ५०॥

विद्येचे सागर असणारे बळाचे डोंगर असणारे, धनाचे कुबेर असणारे सगळे मृत्युपंथानेच गेले. (५०)

गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे ।
गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ॥ ५१॥

मोठ्या पुरुषार्थाचे, अत्यंत पराक्रम गाजवलेले, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते सर्व गेले. (५१)

गेले बहुत शस्त्रधारी । गेले बहुत परोपकारी ।
गेले बहुत नाअनापरी । धर्मरक्षक ॥ ५२॥

अनेक शस्त्रधारी, अनेक परोपकारी, नाना प्रकारे धर्माचे रक्षण करणारे सगळे गेले. (५२)

गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तीचे ।
गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३॥

मोठे प्रतापवान, मोठे कीर्तिमान व अत्यंत नीतीने वागणारे नीतिवंत अनेक राजेही गेले. (५३)

गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी ।
गेले बहुत वेवादी । बहुतांपरीचे ॥ ५४॥

मोठे मतवादी किंवा अनेक मतवादी, अनेक कार्यवादी, अनेक प्रकारचे वादविवाद करणारे सर्व गेले (५४)

गेलीं पंडितांची थाटें । गेलीं शब्दांचीं कचाटें ।
गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५॥

पंडितांचे समुदाय गेले शब्दाची खटपट लटपट करणारे गेले, नाना मतांचे प्रतिपादन करून अचाट वाद करणारे गेले. (५५)

गेले तापषांचे भार । गेले संन्यासी अपार ।
गेले विचारकर्ते सार । मृत्यपंथे ॥ ५६॥

तपस्वी लोकांचे समुदाय गेले, असंख्य संन्यासी गेले सारासार विचार करणारे विचारवंतही मृत्युपंथानेच गेले (५६)

गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी ।
गेले बहुत नानापरी । नाना छंद करूनी ॥ ५७॥

अनेक संसारी गेले, अनेक वेषधारी गेले. नाना प्रकारचे व्यं करणारे अनेकलोक आपला छंद करता करता गेले (५७)

गेले ब्राह्मणसमुदाये । गेले बहुत आच्यार्य ।
गेले बहुत सांगों काये । किती म्हणौनि ॥ ५८॥

ब्राह्मणांचे समुदाय गेले, अनेक आचार्य गेले, असे अनेकानेक लोक गेले. किती म्हणून सांगावे ? (५८)

असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले ।
जे स्वरुपाकार जाले । आत्मज्ञानी ॥ ५९॥

असो. याप्रमाणे सर्व मृत्युपंथानेच गेले, फक्त जे स्वरूपाकार झाले ते आत्मज्ञानीच फक्त एकटे रहिले. (५९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मृत्यनिरूपणनाम समास नववा ॥ ९॥

इति श्रीदासबोधे गुरुशिव्यसंवादे ‘मृत्युनिरूपणनाम’ समास नववा समाप्त.

समास दहावा : वैराग्य निरूपण

॥ श्रीराम ॥

संसार म्हणिजे माहापूर । माजीं जळचरें अपार ।
डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, संसार म्हणजे महापूर आहे. त्यात असंख्य जलचर प्राणी आहेत. संसाराच्या महापुरात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करण्यासाठी धावत येत असतात. (१)

आशा ममता देहीं बेडी । सुसरी करिताती तडातोडी ।
ने‍ऊन दुःखाचे सांकडी- । माजीं घालिती ॥ २॥

आशा आणि ममता या बेड्या सूक्ष्म देहाला बांधून ठेवतात. जलामधील सुसरी शरीराचे लचके तोडून दुःखाच्या कपारीत घालतात. (२)

अहंकारनक्रें उडविलें । ने‍ऊनि पाताळीं बुडविलें ।
तेथुनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥ ३॥

अहंकाररूपी मगर जीवाला पाताळात उंच नेऊन बुडवितो. तेथून सुटणे जीवाला शक्य होत नाही. (३)

काम =मगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वोहटेना । भूलि पडिली ॥ ४॥

कामवासनेची मगरमिठी सुटत नाही. तिरस्कार मनात उत्पन होतो, तो सुटत नाही. मदमत्सर हे विकारही कमी होत नाहीत. अशा प्रकारे माणूस एक प्रकारे मोहित होतो. (४)

वासनाधामिणी पडिली गळां । घालून वेंटाळें वमी गरळा ।
जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥ ५॥

वासनारूपी धामीण गळ्यात पडते. ती गळ्याभोवती वेटोळे घालून विष ओकत असते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळत राहते. म्हणजे वासनेच्या विळख्यात जीव जखडला जातो (५)

माथां प्रपंचाचें वोझें । घे‍ऊन म्हणे माझें माझें ।
बुडतांही न सोडी, फुंजे । कुळाभिमानें ॥ ६॥

डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन जीव सतत ‘माझे माझे’ म्हणत राहतो. बुडायची पाळी आली तरी कुळाभिमानाने फुगतो आणि ते ओझे काही उतरवायला तयार होत नाही. (६)

पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें ।
आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥ ७॥

भ्रांतीचा अंधार पडतो. त्यात अभिमानरूपी चोर सर्वस्व हरण करतो म्हणजे अज्ञानामुळे विपरीत ज्ञान अर्थात देहबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे अहंकार उत्पन्न होतो. तो भूतबाधेप्रमाणे माणसाला झपाटून टाकतो. (७)

बहुतेक आवर्तीं पडिले । प्राणी वाहातचि गेले ।
जेंहिं भगवंतासी बोभाईलें । भावार्थबळें ॥ ८॥

बहुतेक जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडून वाहातच जातात. पण काही माणसे भावार्थाच्या बळावर भगवंताचा धावा करतात. (८)

देव आपण घालूनि उडी । तयांसी नेलें पैलथडी ।
येर तें अभाविकें बापुडीं । वाहातचि गेलीं ॥ ९॥

अशा लोकांना देव स्वतः धाव घेऊन उडी घालून वाचवतो व पैलतीसवर नेतो. बाकी जे श्रद्धाहीन लोक असतात, ते बिचारे त्या महापुरात वाहातच जातात. (९)

भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोन भुलला ।
संकटीं पावे भाविकाला । रक्षितसे ॥ १०॥

भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे. भाविक भक्तांचा भावार्थ पाहून तो भुलतो व संकटात धाव घेऊन भक्तांचे रक्षण करतो. (१०)

जयास भगवंत आवडे । तयाचें देवासीं सांकडें ।
संसारदुःख सकळ उडे । निजदासाचें ॥ ११॥

ज्याला भगवंत मनापासून आवडतो, त्याच्या संकटाचे ओझे भगवंतावर पडते व त्यामुळे भगवंत आपल्या अंतरंग भक्ताचे संसारदुःख सगळे नाहीसे करतो. (११)

जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे ।
धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२॥

जे ईश्वराला सर्वस्वी शरण जातात, त्यांना स्वस्वरूपानुभवामुळे मिळणारा परमानंद प्राप्त होतो. असे भाविकजन खरोखर अत्यंत धन्य होत. (१२)

जैसा भाव जयापासीं । तैसा दैव तयासी ।
जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणीमात्रांचा ॥ १३॥

ज्याचा जसा भाव असतो तसा देव त्याच्याशी वागतो. कारण प्राणिमात्रांच्या अंतर्यामीच भगवान असल्याने त्यांच्या हृदयातील भाव तो अचूक जाणतो. (१३)

जरी भाव असिला माईक । तरी देव होये माहा ठक ।
नवल तयाचें कौतुक । जैशास तैसा ॥ १४॥

भाव जर दिखाऊ असेल तर देवही महाठक होतो. देवाचे हे विशेष कौतुक आहे की, तो जशास तसा वागतो. (१४)

जैसें जयाचें भजन । तैसेंची दे समाधान ।
भाव होतां किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५॥

जशी ज्याची उपासना असेल तसे देव त्याला समाधान देतो. भावात जरा जरी उणीव आली तरी देव दुरावतो. (१५)

दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैस्यास तैसें भासे ।
तयाचें सूत्र असे । आपणाच पासीं ॥ १६॥

आरशात आपले प्रतिबिंब दिसते, ते बघणारा जसा असेल तसेच हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्यापाशीच असते. (१६)

जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें ।
जरी डोळे पसरूनि पाहावें । तरी तेंही टवकारे ॥ १७॥

आपण जशी हालचाल करू, तशीच ते प्रतिबिंब करते. आपण जर डोळे वटारून पाहू लागलो, तर प्रतिबिंबही डोळे वटारून आपल्याकडे पाहाते. (१७)

भृकुटीस घालून मिठी । पाहातां क्रोधें तेंहि उठी ।
आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८॥

आपण जर रागाने कपाळाला आठ्या घालून भुवया चढवून पाहू लागलो, तर तेही क्रोधाने आपल्याकडे पाहू लागते. आपण जर हसून पाहिले तर तेही पोटी आनंदलेले दिसते. (१८)

जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाचि देव जाला ।
जो जैसें भजे त्याला । तैसाचि वोळे ॥ १९॥

ज्याचा जसा भाव असतो, त्या भावाचे प्रतिबिंब असे त्याच्या देवाचे रूप होते. जो त्याला जसा भजतो त्याप्रमाणे तो तसाच प्रसन्न होतो. (१९)

भावें परामार्थाचिया वाटा । वाहाती भक्तीचिया पेंठा ।
भरला मोक्षाचा चोहाटा । सज्जनसंगें ॥ २०॥

भावामुळेच परमार्थाच्या वाटा भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत येऊन पोहोचतात. तेथे संतसज्जनांच्या संगतीत मोक्षाचा चव्हाट्यावर बाजार भरलेला असतो. (२०)

भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरी पावन जाले ।
भावार्थबळें उद्धरिले । पूर्वज तेहीं ॥ २१॥

खऱ्या भक्तिभावनेने जे भगवद्‌भजन करतात, ते भगवंताशी एकरूप होऊन पावन होतात. त्यांनी भावार्थाच्या बळावर आपल्या पूर्वजांचाही उद्धार केलेला असतो. (२१)

आपण स्वयें तरले । जनासहि उपेगा आले ।
कीर्तिश्रवणें जाले । अभक्त, भावार्थी ॥ २२॥

असे भक्त स्वतःही तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात, त्यांच्या तोंडून भगवंताची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात, तेही भावार्थी बनतात. (२२)

धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं ।
तेहिंच येक जन्म जनीं । सार्थक केला ॥ २३॥

जे हरिभजनी लागतात, देवाची भक्ती करू लागतात त्यांची जननी धन्य समजावी. त्यांनीच जगात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावलेला असतो. (२३)

तयांची वर्णूं काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी ।
कासे लाऊन उतरी । पार दुःखाचा ॥ २४॥

ज्यांचा कैवार प्रत्यक्ष भगवंत घेतो व स्वतः आपल्या कासेला लावून दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो, त्यांची थोरवी काय वर्णावी बरे ? (२४)

बहुतां जन्मांचे सेवटीं । जेणें चुके अटाटी ।
तो हा नरदेह भेटी । करी भगवंतीं ॥ २५॥

अनेक जन्मांच्या शेवटी ह्या नरदेहाची प्राप्ती होते. त्यायोगे सर्व यातायात चुकते. एवढेच नव्हे तर या देहातच भगवद्‌दर्शन, होऊ शकते. (२५)

म्हणौन धन्य ते भाविक जन । जेंहिं जोडिलें हरिनिधान ।
अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि आलें ॥ २६॥

म्हणून ज्यांनी हरिरूपी संपत्ती जोडली, ते भाविक जन धन्य आहेत. त्यांच्या अनंत जन्मांतरींचे पुण्य फळास आले असे समजावे. (२६)

आयुष्य हेचि रत्नपेटी । माजीं भजनरत्नें गोमटीं ।
ईश्वरीं अर्पूनिया लुटी । आनंदाची करावी ॥ २७॥

मानवाचे आयुष्य ही ज्यात सुंदर अशी भजनरत्‍ने भरलेली आहेत, अशी रत्नपेटीच आहे. यातील भजनरूपी रत्‍ने ईश्वरास अर्पण करून मानवाने आनंदाची लयलूट करावी. (२७)

हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ ।
सदा सर्वदा संतुष्ट । नैराशबोधें ॥ २८॥

हरिभक्त हा लौकिक वैभवाच्या दृष्टीने कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादी देवांपेक्षा वरिष्ठ समजावा. कारण तो दुर्लभ अशा अनासक्तीने सदासर्वदा संतुष्ट असतो. (२८)

धरून ईश्वराची कास । केली संसाराची नैराश ।
तयां भाविकां जगदीश । सबाह्य सांभाळी ॥ २९॥

जो संसारातील कुणाचीही आणि कशाचीही आशा न बाळगता केवळ ईश्वरावर विसंबून त्यास सर्वभावे शरण जातो, त्या भाविकांचा जगदीश आत व बाहेर सांभाळ करतो. (२९)

जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परमसुख ।
संसारसुखाचेनि पढतमूर्ख । लोधोन पडती ॥ ३०॥

ज्याला संसारातील दुःखही विवेकाच्या योगे परम सुखच वाटते, जे पढतमूर्ख असतात, ते मात्र संसारसुखाच्या आशेने संसारातच आसक्त होतात. (३०)

जयांचा ईश्वरीं जिव्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा ।
जयांचा जनावेगळा । ठेवा आक्षै ॥ ३१॥

ज्यांना ईश्वराविषयी आत्यंतिक प्रेम असते ते भक्त स्वानंद-सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो. पण तो सामान्य जनांच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. (३१)

ते आक्षै सुखें सुखावले । संसारदुःखें विसरले ।
विषयेरंगी वोरंगले । श्रीरंगरंगीं ॥ ३२॥

ते अक्षय सुखाने सुखावून संसारदुःखे विसरून जातात. ते निरिच्छ होतात आणि श्रीभगवंताच्या प्रेमात रंगून जातात. (३२)

तयांस फावली नरदेह पेटी । केली ईश्वरेंसिं साटी ।
येरें अभाविकें करंटीं । नरदेह गेला ॥ ३३॥

ज्यांनी देहबुद्धी देऊन ईश्वर मिळविण्याची अदलाबदल केली, त्यांनी या नरदेहाचे सार्थक केले. ही नरदेहरूपी रत्‍नपेटी त्यांनाच लाभली असे म्हणावे लागते. इतर अभागी अभाविक आपला मनुष्यदेह वाया चघालवितात (३३)

आवचटें निधान जोडलें । तें कवडिच्या बदल नेलें ।
तैसें आयुष्य निघोनि गेलें । अभाविकाचें ॥ ३४॥

अकस्मात एखाद्यास रत्‍न सापडले असता त्याने ते कवडीच्या बदल्यात घालवावे तसे अश्रद्ध लोकांचे आयुष्य कवडीमोलाने निघून जाते. (३४)

बहुता तपाचा सांठा । तीणें लाधला परीस गोटा ।
परी तो ठा‍ईंचा करंटा । भोगूंच नेणे ॥ ३५॥

एखाद्याने खूप तप करावे आणि त्याचे फळ म्हणून त्याल परिस मिळावा, पण मुळातच तो अत्यंत अभागी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्याला कळत नाही. (३५)

तैसा संसारास आला । मायाजाळीं गुंडाळला ।
अंतीं येकलाचि गेला । हात झाडुनी ॥ ३६॥

त्याप्रमाणे जो या संसारात मनुष्य म्हणून जन्मूनही मायेच्या पाशात गुंडाळला जातो आणि अखेर हात झाडून सर्व काही इथेच सोडून एकटाच निघून जातो (३६)

या नरदेहाचेनि संगतीं । बहुत पावले उत्तम गती ।
येकें बापुडी यातायाती । वरपडी जालीं ॥ ३७ ॥

या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम गतीची प्राप्ती करून घेतली, पण काही बिचारे यातायातीतच गुंतले आणि दुःखी झाले. (३७)

या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावे संतसंगें ।
नीचयोनीं दुःख मागें । बहुत भोगिलें ॥ ३८॥

या उत्तम नरदेहाचे संतसमागम करून शक्य तितक्या लवकर सार्थक करावे. मागे अनेक नीचयोनीत आपण खूप भोगलेले आहे, याचे स्मरण ठेवावे. (३८)

कोण समयो ये‍ईल कैसा । याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥ ३९॥

केव्हा कशी वेळ येईल याचा भरवसा नसतो. आपण ते जाणूही शकत नाही. पक्षी जसे रात्री एखाद्या वृक्षावर एकत्र जमतात व प्रातःकाळ होताच दाही दिशांना उडून जातात, त्याप्रमाणे मानवी जीवनही आहे. (३९)

तैसें वैभव हें सकळ । कोण जाणे कैसी वेळ ।
पुत्रकळत्रादि सकळ । विघडोन जाती ॥ ४०॥

तसेच हे वैभवादी सर्व जाणावे. केव्हा कशी वेळ येईल, हे कोणीही जाणू शकत नाही. वाईट वेळ आली तर बायकोमुले वगैरे सर्व सोडून जातात अथवा एखादे वेळी नष्टही होतात. (४०)

पाहिली घडी नव्हे आपुली । वयसा तरी निघोन गेली ।
देह पडतांच ठेविली- । आहे नींच योनी ॥ ४१॥

जो क्षण येताना आपण पाहतो, तो लगेच आपल्या हातून निसटून जातो. अशा प्रकारे बघता बघता आयुष्य निघून जाते आणि हा स्थूल देह पडला की नीच योनी प्राप्त होते. (४१)

स्वान शुकरादिक नीच याती । भोगणें घडे विपत्ती ।
तेथे कांहीं उत्तम गती । पाविजेत नाहीं ॥ ४२॥

कुत्रा, डुक्कर इत्यादी नीच योनीत जन्म होतो आणि दुःख भोगावे लागते. त्या योनीत गेल्यावर उत्तम गती मिळणे अशक्यच असते. (४२)

मागा गर्भवासीं आटाटी । भोगितां जालासि रे हिंपुटी ।
तेथुनियां थोरा कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३॥

मागे गर्भवासात यातना भोगताना जीव कष्टी झालेला असतो. त्यातून सुदैवाने अत्यंत कष्टाने एकदाची सुटका होते. (४३)

दुःख भोगिलें आपुल्या जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें ।
तैचेंचि पुढें येकलें जावें । लागेल बापा ॥ ४४॥

गर्भवासात जेव्हा जीव दुःख भोगतो, तेव्हा कुणी मदतीला येऊ शकत नाही. तसेच पुढे आयुष्याच्या शेवटीही जीवाला एकटेच जावे लागणार आहे ! ‘ अरे बाबा, हे लक्षात घे. ‘ (४४)

कैंचि माता कैंचा पिता । कैंचि बहिण कैंचा भ्राता ।
कैंचीं सुहृदें कैंची वनिता । पुत्रकळत्रादिक ॥ ४५॥

कुठली आई आणि कुठला बाप, कुठली बहीण आणि कुठला भाऊ ! कुठले मित्र आणि कुठली बायको ! कुठली मुलेबाळे व इतर नातेवाईक ! (४५)

हे तूं जाण मावेचीं । आवघीं सो‍इरीं सुखाचीं ।
हे तुझ्या सुखदुःखाचीं । सांगाती नव्हेती ॥ ४६॥

ही सर्व मायिक आहेत, हे तू जाणून घे. सगळी त्यांच्या त्यांच्या सुखाच्या आशेने तुझ्याभोवती गोळा झालेली आहेत. ही तुझ्या सुख-दुःखात तुला साथ देऊ शकत नाहीत. (४६)

कैंचा प्रपंच कैंचे कुळ । कासया होतोसी व्याकुळ ।
धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें ॥ ४७॥

कसला प्रपंच आणि कसले कुळ ! त्यासाठी कशाला व्याकुळ होतोस ? धनधान्य, ऐश्वर्य आदी सर्व अशाश्वत आहे. (४७)

कैंचें घर कैंचा संसार । कासया करिसी जोजार ।
जन्मवरी वाहोन भार । सेखीं सांडून जासी ॥ ४८॥

कसले घर आणि कसला संसार ! उगीच कशाला यातायात करतोस ? जन्मभर त्यांचे ओझे वाहून अखेर ते सर्व सोडून जावेच लागते. (४८)

कैंचें तारुण्य कैंचे वैभव । कैंचें सोहळे हावभाव ।
हें सकळहि जाण माव । माईक माया ॥ ४९॥

कसले तारुण्य, कसले वैभव ! कसले सोहळे आणि कसले हावभाव ! हे सर्व मायिक आहे आणि भुलवून मायेच्या पाशात अडकविणारे आहे, हे जाणून घे. (४९)

येच क्षणीं मरोन जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी ।
माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां ॥ ५०॥

याच क्षणी मरून गेलास, तर रघुनाथाला अंतरलास असे समज. कारण हा देह, संसार यांना तू माझे-माझे म्हणतोस, म्हणून मी तुला हे सांगतो. (५०)

तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसीं मायबापें किती ।
स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥ ५१॥

तू आत्तापर्यंत किती जन्म घेतलेस ! त्यावेळी असे आईवडील वगैरे किती झाले ? स्त्री, पुत्र, कन्या वगैरेंची गणती करू लागल्यास लक्षावधी संख्या भरेल. (५१)

कर्मयोगें सकळ मिळालीं । येके स्थळीं जन्मास आलीं ।
तें तुवां आपुलीं मानिलीं । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२॥

पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने सर्व एका स्थळी जमतात, एका स्थळी जन्म घेतात, ती तू आपली कशी रे मानलीस, पढतमूर्खा ! (५२)

तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार ।
आतां येक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३॥

तुझे म्हणून तुला वाटणारे हे शरीरही जर तुझे नाही, तर इतरांचा कसला विचार करायचा ? आता खरोखर मनःपूर्वक एका भगवंतालाच भावार्थाच्या बळाने घट्ट धरून ठेव. (५३)

येका दुर्भराकारणें । नाना नीचांची सेवा करणें ।
नाना स्तुती आणी स्तवनें । मर्यादा धरावी ॥ ५४॥

आपल्या कधीही न भरणाऱ्या पोटासाठी आपल्याला अनेक नीच लोकांची सेवा करावी लागते. त्यांची स्तुतिस्तोत्रे गाऊन त्यांच्यापुढे मर्यादेने वागावे लागते. (५४)

जो अन्न देतो उदरासी । शेरीर विकावें लागे त्यासी ।
मां जेणें घातलें जन्मासी । त्यासी कैसें विसरावें ॥ ५५॥

जो पोटाला अन्न देतो, त्याच्या सेवेत मानवी शरीर विकावे लागते. मग ज्याने हा दुर्लभ मनुष्य देह दिला, त्याला कसे काय विसरावे ? (५५)

अहिर्निशीं ज्या भगवंता । सकळ जिवांची लागली चिंता ।
मेघ वरुषे जयाची सत्ता । सिंधु मर्यादा धरी ॥ ५६॥

ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली असते व ज्याच्या सत्तेने मेघ जलवृष्टी करतात, समुद्र आपली मर्यादा सांभाळतो, (५६)

भूमि धरिली धराधरें । प्रगट हो‍ईजे दिनकरें ।
ऐसी सृष्टी सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७॥
ऐसा कृपाळु देवाधिदेव । नेणवे जयाचें लाघव ।
जो सांभाळी सकळ जीव । कृपाळुपणें ॥ ५८॥

शेष पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करतो, सूर्य उदयास येतो, असा आपल्या सत्तामात्रेकरून जो सर्व वृष्टी चालवितो, असा परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. त्याची लीला जाणता येत नाही. कृपाळूपणे तोच सर्व जीवांचा सांभाळ करीत असतो. ५७ -८८

ऐसा सर्वात्मा श्रीराम- । सांडून, धरिती विषयकाम ।
ते प्राणी दुरात्मे अद्धम । केलें पावती ॥ ५९॥

अशा सर्वांच्या अंतर्मायी आत्मरूपाने असलेल्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषयांची इच्छा करतात, ते अत्यंत अधम दुरात्मे स्वतःच्या केलेल्या कर्मांची फळेच भोगत असतात. (५९)

रामेविण जे जे आस । तितुकी जाणावी नैराश ।
माझें माझें सावकाश । सीणचि उरे ॥ ६०॥

रामाशिवाय जी जी इच्छा करावी ती ती निरर्थकच जाणावी. ‘माझे, माझे’ करता करता शेवटी कष्टच उरतात. (६०)

जयास वाटे सीण व्हावा । तेणें विषयो चिंतीत जावा ।
विषयो न मिळतां जीवा । तगबग सुटे ॥ ६१॥

ज्याला कष्टच व्हावे असे वाटत असेल, त्याने सतत विषयांचेच चिंतन करावे. विषयाची प्राप्ती झाली नाही की, जीवाची अगदी तगमग होते. (६१)

सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥ ६२॥

आनंदघन म्हणजे मूर्तिमंत आनंदच अशा रामाचे चिंतन करावयाचे सोडून जो मनात सतत विषयाचे चिंतन करतो, त्या विषयासक्त माणसाला समाधान कसे प्राप्त होणार ? (६२)

जयास वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनीं लागावें ।
स्वजन सकळही त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३॥

ज्याला आपल्याला सदैव सुखच लाभावे असे वाटत असेल त्याने रघुनाथभजनी लागावे आणि जे दुःखाचे मूळ आहेत, अशा सर्व स्वजनांचा त्याग करावा. (६३)

जेथें वासना झोंबोन पडे । तेणेंचि अपायें दुःख जडे ।
म्हणौनि विषयवासना मोडे । तो येक सुखी ॥ ६४॥

ज्या वस्तू अथवा व्यक्तीच्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडते, तेथे जीवाला अपाय होतो व दुःखच प्राप्त होते. म्हणून ज्याची विषयवासना नाहीशी होते, तोच माणूस सुखी होतो. (६४)

विषयजनित जें जें सुख । तेथेंचि होतें परम दुःख ।
पूर्वीं गोड अंतीं शोक । नेमस्त आहे ॥ ६५॥

विषयांपासून जे जे सुख मिळावे अशी माणूस इच्छा करतो, तेच त्याच्या परमदुःखास कारणीभूत होते. पहिल्याने ते गोड वाटते, पण परिणामी शोकदायकच ठरते, असे निश्चितपणे समजावे. (६५)

गळ गिळितां सुख वाटे । वोढून घेतां घसा फाटे ।
कां तें बापुडें मृग आपटे । चारा घे‍ऊन पळतां ॥ ६६॥

माशाला गळ गिळताना त्याला लावलेल्या आमिषाच्या लोभामुळे प्रथम सुख वाटते. नंतर तो गळ जेव्हा ओढून घेतला जातो, तेव्हा त्याचा घसा फाटून मृत्यू ओढवतो किंवा हरीण हिरवा चारा तोंडात घेऊन पळत असता बिचारे दगडावर आपटते व तोंड फोडून घेते. (६६)

तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी ते कुडी ।
म्हणौनियां आवडी । रघुनाथीं धरावी । ६७॥

त्याप्रमाणेच विषयसुखाचे आहे. पहिल्याने ते गोड वाटते, पण अंती ते वाईट परिणाम करणारे ठरते. म्हणून रघुनाथ भजनाचीच आवड धरावी. (६७)

ऐकोनि बोले भाविक । कैसेनि घडे जी सार्थक ।
सांगा स्वामी येमलोक । चुके जेणें ॥ ६८॥

समर्थांनी केलेला हा उपदेश ऐकून भाविक त्यांना विनंती करू लागले की, स्वामी ! या नरदेहाचे सार्थक कशाने होईल आणि यमलोकापासून सुटका कशी होईल हे आपण कृपा करून सांगावे. (६८)

देवासी वास्तव्य कोठें । तो मज कैसेंनि भेटे ।
दुःखमूळ संसार तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९॥

देव कोठे राहतो, मला तो कसा भेटेल, दुःखमूळ असा हा संसार काय केल्याने नष्ट होईल हे स्वामी ! मला हे सर्व सांगा. (६९)

धडपुडी भगवत्प्राप्ती- । हो‍ऊन, चुके अधिगती ।
ऐसा उपाये कृपामूर्ती । मज दीनास करावा ॥ ७०॥

प्रत्यक्ष भगवत्‌प्राप्ती होऊन अधोगती चुकेल असा उपाय कृपामूर्ती अशा आपण मज दीनाला सांगावा. (७०)

वक्ता म्हणे हो येकभावें । भगवद्भजन करावें ।
तेणें हो‍ईल स्वभावें । समाधान ॥ ७१॥

तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की, एकनिष्ठ भावाने भगवद्‌भजन करावे म्हणजे त्यायोगे अगदी सहज समाधान प्राप्त होईल. (७१)

कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन ।
भगवद्भजनाचें लक्षण । मज निरोपावें ॥ ७२॥

तेव्हा श्रोता विचारतो की, भगवद्‌भजन कसे करावे ? मन कुठे एकाग्र करावे ? भगवद्‌भजनाचे लक्षण काय ? हे सर्व आपण मला समजावून द्यावे. (७२)

ऐसा म्लानवदनें बोले । धरिले सदृढ पाऊलें ।
कंठ सद्गनदित, गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३॥

असे म्लान वदनाने म्हणून श्रोत्याने वक्त्याची पावले सुदृढपणे धरली. त्याचा कंठ सद्‌गदित होऊन, दुःखाने डोळ्यांतून अश्रू गळू लागले. (७३)

देखोन शिष्याची अनन्यता । भावें वोळला सद्गु्रु दाता ।
स्वानंद तुंबळेल आतां । पुढिले समासीं ॥ ७४॥

ही शिष्याची अनन्यता पाहून व त्याचा एकनिष्ठ भाव पाहून सद्‌गुरू प्रसन्न झाले व ज्ञान देण्यास उत्सुक झाले. आता पुढील समासात या गुरुशिष्यांच्या संवादात स्वानंद उचंबोळून येईल. (७४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
वैराग्यनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘वैराग्यनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक तीसरा समाप्त ॥

श्रीमत् दासबोध

दशक चवथा : नवविधा भक्ती

समास पहिला : श्रवणभक्ती

श्रीराम

जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था ।
अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, श्री गणनाथाचा जयजयकार असो. हे गणनाथा, तू विद्यावैभवाने संपन्न असून ती दुसऱ्यास देण्याचे सामर्थ्यही तुजपाशी आहे. अध्यात्मविद्येचे रहस्य असा जो परमार्थ तो माझ्याकडून आपणच वदवून घ्यावा. (१)

नमूं शारदा वेदजननी । सकळ सिद्धि जयेचेनी ।
मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २॥

वेदजननी जी शारदा तिला मी वंदन करतो. तिच्या कृपेने सर्व कार्ये सिद्धीला जातात. तिच्या कृपेनेच स्फूर्तिरूपाने माझे मन चिंतनात प्रवर्तले आहे. (२)

आतां आठऊं सद्गु रु । जो पराचाहि परु ।
जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥ ३॥

नंतर श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ अशा श्रीसद्‌गुरूचे स्मरण करू. कारण गुरुकृपेमुळेच ज्ञानविचार कळू लागतो. (३)

श्रोतेन पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें ।
म्हणौनि बोलिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४॥

श्रोत्यांनी चांगला प्रश्न केला आहे की, भगवद्‌भजन कसे करावे ? म्हणून स्वाभाविकच निरनिराळ्या ग्रंथांतील भगवद्- भजनासंबंधीची वचने येथे सांगतो. (४)

सावध हो‍ऊन श्रोतेजन । ऐका नवविधा भजन ।
सत्शाहस्त्रीं बोलिले, पावन- । हो‍ईजे येणें ॥ ५॥

तरी श्रोत्यांनी सावध होऊन नवविधा भक्तीसंबंधी सतूशास्त्रात जे वर्णन आले आहे ते ऐकावे व त्यायोगे पावन व्हावे. (५)

श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥

अर्थ- श्रवण, कीर्तन, श्री विष्णूचे नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत. (१)

नवविधा भजन बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें ।
श्रोतीं अवधान दिधलें । पाहिजे आतां ॥ ६॥

याप्रमाणे शास्त्रात जे नऊ प्रकारचे भजन सांगितले आहे, त्याचेच सविस्तर वर्णन पुढे केले आहे. तरी श्रोत्यांनी आता नीट लक्ष द्यावे. (६)

प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथापुराणश्रवण ।
नाना अध्यात्मनिरूपण । ऐकत जावें ॥ ७॥

नऊ प्रकारांपैकी पहिले भजन कसे असते, ते ऐकावे. भगवंतांच्या कथा ऐकाव्यात, पुराण श्रवण करावे आणि नाना प्रकारे अध्यात्मनिरूपण केले जाते, तेही ऐकावे. (७)

कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ८॥

कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धान्तमार्ग योगमार्ग, वैरुग्यमार्ग इत्यादी सर्वांचे श्रवण करीत जावे. (८)

नाना व्रतांचे महिमे । नाना तीर्थांचे महिमे ।
नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ ९॥

नाना व्रतांचे महत्त्व, नाना तीर्थांचे महत्त्व व नाना दानांचे माहात्म्य ऐकत जावे. (९)

नाना माहात्म्यें नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें ।
नाना तपें पुरश्चरणें । ऐकत जावीं ॥ १०॥

नाना माहात्म्ये, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना प्रकारचे तप व नाना पुरश्चरणे यासंबंधीचे वर्णन ऐकत जावे. (१०)

दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी ।
तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ ११॥

दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पानाहारी, तृणाहारी असे नाना प्रकारचे आहार घेणारे लोक कसे असतात, ते ऐकावे. (११)

उष्णवास जळवास । सीतवास आरण्यवास ।
भूगर्भ आणी आकाशवास । कैसे ते ऐकावे ॥ १२॥

कुणी उन्हात राहणारे, कुणी पाण्यात राहणारे, कुणी थंडीत शहणारे, कुणी अरण्यात राहणारे, तर कुणी जमिनीत खड्डा खणून त्यात राहणारे, तर कुणी आकाशात राहणार कसे असतात, ते ऐकावे. (१२)

जपी तपी तामस योगी । नाना निग्रह हटयोगी ।
शाक्तआगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ॥ १३॥

जप करणारे तप करणारे, अत्यंत तापट असणारे योगी, नाना प्रकारे निग्रह करणारे हठयोगी, शक्तिउपासक व कापालिक कसे असतात, ते सर्वही ऐकावे. (१३)

नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्षस्थानें ।
पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तें ऐकावीं ॥ १४॥

योगशास्त्रात वर्णिलेल्या नाना मुद्रा, नाना आसने, नाना प्रकाशाची रूपे, ज्यावर मन सुलभतेने स्थिर करता येते अशी लक्ष्य स्थाने तसेच पिंडज्ञाने तत्त्वज्ञाने कशी आहेत तेही ऐकावे. (१४)

नाना पिंडांची रचना । नाना भूगोळरचना ।
नाना सृष्टीची रचना । कैसी ते ऐकावी ॥ १५॥

नाना प्राण्यांच्या शरीराची रचना, पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रदेशांची रचना, नाना वृष्टीची रचना कशी झाली आहे, तेही ऐकावे. (१५)

चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें मेघमंडळें ।
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । कैसीं ते ऐकावीं ॥ १६॥

चंद्र, सूर्य, तारांचे समूह, विविध ग्रहांचे समुदाय, मेघांचे समुदाय, एकवीस स्वर्ग आणि सक्षपाताळ यांचे विवरणही ऐकावे. (१६)

ब्रह्माविष्णुमहेशस्थानें । इन्द्रदेवऋषीस्थानें ।
वायोवरुणकुबेरस्थानें । कैसीं ते ऐकावीं ॥ १७ ।

ब्रह्मा, विष्णू महेश यांची स्थाने, तसेच इंद्र, देव, ऋषी यांची स्थाने, वायू वरुण, कुबेर यांची स्थाने कशी आहेत तेही ऐकावे. (१७)

नव खंडे चौदा भुवनें । अष्ट दिग्पाळांची स्थानें ।
नाना वनें उपवनें गहनें । कैसीं ते ऐकावीं ॥ १८॥

नऊ खंडे चौदा भुवने, अष्ट दिक्पालांची स्थाने, तसेच नाना वने, उपवने, गहन अरण्ये यांची माहितीही ऐकावी. (१८)

गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर ।
अष्ट नायका संगीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ १९॥

शिवगण, देवगण, गंधर्व, विद्याधर यक्ष, किन्नर, नारद, तुंबर इत्यादींची माहिती, तसेच अष्टनायिका आणि संगीतशास्त्र यांची माहितीही ऐकावी. (१९)

रागज्ञान ताळज्ञान । नृत्यज्ञान वाद्यज्ञान ।
अमृतवेळ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २०॥

रुगज्ञान, तालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, मुहूर्तज्ञान, प्रसंगज्ञान कसे असते, तेही ऐकावे (२०)

चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा ।
बत्तीस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥ २१॥

चौदा विद्या, चौसष्ट कला, हातावरील रेषांची लक्षणे, इतर कला, व माणसाच्या अंगी असणारी बत्तीस लक्षणे, वगैरे नाना कलांची माहिती ऐकावी. (२१)

मंत्र मोहरे तोटके सिद्धी । नाना वल्ली नाना औषधी ।
धातु रसायण बुद्धी । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २२॥

मंत्र, विविधतोडगे, सर्व सिद्धी, नाना औषधी, मणी, नाना वल्ली, विविध धातू विविध रसायने तयार करण्याच्या क्रिया, नाडी परीक्षा इत्यादी गोष्टीही ऐकाव्यात. (२२)

कोण्या दोषें कोण रोग । कोणा रोगास कोण प्रयोग ।
कोण्या प्रयोगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २३॥

कुठल्या दोषामुळे कुठला रोग होतो, कुठल्या रोगावर कुठल्या औषधाचा प्रयोग करावा, कुठल्या प्रयोगात कुठल्या योगावर आरंभ केला असता तो सिद्धीस जातो, हे सर्व ऐकून घ्यावे. (२३)

रवरवादि कुंभपाक । नाना यातना येमेलोक ।
सुखसुःखादि स्वर्गनर्क । कैसा तो ऐकावा ॥ २४॥

रौरव नरक, कुंभपाक नरक, इत्यादी नाना यातना ज्यात भोगाव्या लागतात ते सर्व नरक, तसेच यमलोक कसा आहे, स्वर्गातील सुख व नरकातील दुःख कसे असते, तेही सर्व ऐकावे. (२४)

कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती ।
कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें ॥ २५॥

नवविधा भक्ती कोणत्या आहेत, चार प्रकारच्या मुक्ती कोणत्या आहेत, उत्तम गती प्रास होण्यासाठी काय करावे, हे सर्व ऐकून घ्यावे. (२५)

पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवंचना ।
सारासारविचारणा । कैसी ते ऐकावी ॥ २६॥

पिंडब्रह्मांडाची रचना, नाना तत्त्वविवंचना तसेच सारासार विचार म्हणजे काय हेही ऐकावे (२६)

सायोज्यता मुक्ती कैसी होते । कैसें पाविजे मोक्षातें ।
याकारणें नाना मतें । शोधित जावीं ॥ २७॥

सायुज्यता मुक्ती कशी मिठ्ये, मोक्षाची प्राप्ती कशी होते, हे जाणून घेण्यासाठी नाना मतांचा शोध घ्यावा. (२७)

वेद शास्त्रें आणी पुराणें । माहावाक्याचीं विवरणें ।
तनुशतुष्टयनिर्शनें । कैसीं ते ऐकावीं ॥ २८॥

वेद, शाखे, पुतणे, महावाक्यावरील विवरणे तसेच चार देहांचे निरसन कसे करावे हे सर्व ऐकावे. (२८)

ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।
असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति ॥ २९॥

अशा रीतीने हे सर्व ऐकावे व विचार करून त्यातील सार शोधून काढावे व ते ग्रहण करावे. असार असेल ते जाणून घेऊन त्याचा त्याग करावा. यालाच श्रवणभक्ती असे नाव आहे. (२९)

सगुणाचीं चरित्रें ऐकावीं । कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं ।
श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं ॥ ३०॥

भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन ऐकावे तसेच त्याचे निर्गुण स्वरूपही तत्त्वमीमांसेने जाणून घ्यावे ही श्रवणभक्तीची लक्षणे होत. (३०)

सगुण देवांचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्वें यंत्रें ।
हे दोनी परम पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३१॥

भगवंताची सगुण चरित्रे व निर्गुणाची तत्त्वे, यंत्रे ही दोन्ही परम पवित्र असल्याने ती ऐकावीत. (३१)

जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र जप ध्यानें ।
कीर्ति स्तुती स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३२॥

सगुण भक्तीसाठी जयंत्या, उपोषणे, नाना साधने, नाना मंत्र, यंत्र, जप व ध्याने तसेच भगवंताची कीर्ती, त्याची स्तुतिस्तोत्रे, भजने यांचे विविध प्रकार हे सर्व काही ऐकावे. (३२)

ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें ।
विभक्ती सांडून भक्तीचें । मूळ शोधावें ॥ ३३॥

याप्रमाणे सगुणाचे श्रवण करावे आणि निर्गुणाचे अध्यात्मनिरूपणाच्या योगे ज्ञान करून घ्यावे थोडक्यात म्हणजे वेगळेपणाचा त्याग करून ऐक्यतेचे, भक्तीचे मूळ शोधावे, भगवंताशी एकरूपता कशी होईल हे जाणून घ्यावे. (३३)

श्रवणभक्तीचें निरूपण । निरोपिलें असे जाण ।
पुढें कीर्तन भजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३४॥

आत्तापर्यंत श्रवणभक्तीचे निरूपण केले. आता पुढे कीर्तनभजनाचे लक्षण सांगितले जाईल. (३४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रवणभक्तिनिरूपणनाम समास पहिला ॥ १॥

इति श्रीदासवोथे गुरुशिष्यसंवादे ‘श्रवणभक्तिनाम’ समास पहिला समास

GO TOP

समास दुसरा : कीर्तनभक्ती

॥ श्रीराम ॥

श्रोतीं भगवद्‌भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें ।
त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, श्रोत्यांनी भगवद्यजनासंबंधी प्रश्न केला. ते भगवद्‌भजन नऊ प्रकारचे आहे म्हणून सांगितले. प्रथम श्रवणाचे वर्णन केले. आता दुसरा प्रकार ‘ कीर्तन ‘ त्याचे वर्णन ऐका. (१)

सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ती वाढवावी ।
अक्षंड वैखरी वदवावी । येथायोग्य ॥ २॥

भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन करवे, नित्य हरिकथा र करावी. भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करावे, ती वाढवावी. आपल्या वैखरी वाणीचा अखंड यथायोग्य उपयोग करून भगवद्यणवर्णन तिचेकडून अखंड करवावे. (२)

बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर ।
भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३॥

खूप पाठांतर करावे, खूप ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सारांश कंठस्थ करावा व निरंतर भगवंताची कथा सांगत जावी. (३)

अपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा ।
हरिकथेवीण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४॥

स्वतःचे हित साधण्यासाठी, म्हणजेच मनुष्यजन्म सार्थकी लावून भगवखती करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी. त्याशिवाय कधी राहूच नये. (४)

नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतचि करावा ।
हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥

हरिकथेत रोज नित्य नवा रस उत्पन्न होईल असा हव्यास धरावा. त्यासाठी खूपच प्रयत्न करावा. सर्व ब्रह्मांड हरिकीर्तनाने दुमदुमून सोडावे. (५)

मनापासून आवडी । जीवापासून अत्यंत गोडी ।
सदा सर्वदा तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६॥

हरिकीर्तनाची अगदी मनापासून आवड असावी. त्याची गोडी अगदी जीवाभावापासून असावी आणि सदासर्वदा हरिकीर्तनाचीच उत्कंठा असावी. (६)

भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तनें समाधान होये ।
बहुत जनासी उपाये । हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७॥

भगवंतास कीर्तन अत्यंत प्रिय आहे. कीर्तनानेच समाधान प्रास होते. श्रोता व वक्ता यांना समाधान देऊन बहुजनसमाजाचाही उद्धार होण्याकरिता कलियुगात हरिकीर्तन हाच उत्तम उपाय आहे. (७)

विविध विचित्रें ध्यानें । वर्णावीं आळंकार भूषणें ।
ध्यानमूर्ति अंतःकरणें- । लक्षून, कथा करावी ॥ ८॥

भगवंताच्या विविध आणि अद्‌भुत रूपांचे वर्णन करावे. त्याच्या वस्त्रालंकारांचे, भूषणांचे वर्णन अशा प्रकारे करावे की, अंतःकरणात ते ध्यान ठसले पाहिजे, अशा रीतीने भगवंताचे ध्यान मनात धरून कथा करावी. (८)

येश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा ।
जेणें भगवद्भkक्तांचा आत्मा । संतुष्ट होये ॥ ९॥

भगवंताचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा अत्यंत आवडीने अशा प्रकारे वर्णावा की, जेणेकरून तो ऐकत असता भगवद्‌भक्ताचा आत्मा संतुष्ट होईल. (९)

कथा अन्वय लापणिका । नामघोष करताळिका ।
प्रसंगें बोलाव्या अनेका । धात माता नेमस्त ॥ १०॥

भगवन् कथा सांगताना सुसंगती असावी. शब्दपांडित्य, वस्तूत्व असावे. अधूनमधून भगवंताच्या नामाचा घोष करावा. सर्वांनी रुळया वाजवाव्या. प्रसंगानुसार पुराणादी शास्त्रीय ग्रंथातून वर्णिलेले दृष्टान्तादी प्रसंग, तसेच प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे दृष्टान्त यांचा उपयोग विवेचन नीट समजण्याकरिता करावा. (१०)

ताळ मृदांग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान ।
नाना कथानुसंधान । तुटोंचि नेदावें ॥ ११॥

हरिकीर्तनात रंग भरण्यासाठी टाळ मृदुंग, संगीत, मृत्य, तानमान यांचा उपयोग करावा; पण या सगळ्यांमध्ये कथेचा मागचा, पुढचा संबंध तुटणार नाही, याची काळजी घ्यावी. (११)

करुणा कीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटें ।
श्रोतयांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२॥

कथा सांगताना करुण रसाचा आविष्कार व्हावा. करुणरसाचे लोट वाहतील अशी घडघडायने कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून यकावेत. (१२)

कंप रोमांच स्फुराणें । प्रेमाश्रुसहित गाणें ।
देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे ॥ १३॥

कंप, रोमांच, स्कृरण, प्रेमाधू इत्यादी अष्टसात्त्विक भाव प्रगटहोतील अशा प्रकारेकथा करावी. प्रेमाने भगवंताचे गुणगान करून देवद्वारी लोयंगणे, नमस्कार घालावेत. (१३)

पदें दोहडें श्लोक प्रबंद । धाटी मुद्रा अनेक छंद ।
बीरभाटिंव विनोद । प्रसंगें करावे ॥ १४॥

प्रसंगानुसार पदे, दोहे श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा, अनेक छंद, वीरश्री निर्माण करणारे भाषण व विनोद यांचा उपयोग करावा. (१४)

नाना नवरसिक श्रृंघारिक । गद्यपद्याचें कौतुक ।
नाना वचनें प्रस्ताविक । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५॥

कथेमध्ये रुंगाससकट नवरस असावेत. उत्तम गद्य- पद्य वाङ्मय बोलावे. शास्त्राधारे प्रसंगाला अनुसरून नाना वचने बोलावीत. (१५)

भक्तिज्ञान वैराग्य लक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।
साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावें ॥ १६॥

कीर्तनात भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची लक्षणे, तसेच नीती, न्याय व स्वधर्मरक्षण यासाठी काय करावे, विविध साधनमार्ग कोणते आहेत व परमात्मस्वरूप कसे आहे, यासंबंधीचे प्रांजळ निरूपण असावे. (१६)

प्रसंगें हरिकथा करावी । सगुणीं सगुणकीर्ति धरावी ।
निर्गुणप्रसंगें वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७॥

प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या सगुण चरित्राचे, कीर्तीचे वर्णन करावे, निर्गुणाचा प्रसंग असेल तर अध्यात्माचे निरूपण करून अध्यात्मविद्या वाढवावी. (१७)

पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- । निरूपण करावें नेमस्त ।
बहुधा बोलणें अव्यावेस्त । बोलोंचि नये ॥ १८॥

प्रथम पूर्वपक्ष त्यागून नंतरसिद्धान्त निरूपण नेमस्तपणे म्हणजे यथायोग्य रीतीने करावे. शक्य तो विषयाला सोडून अस्ताव्यस्त बोलूच नये. (१८)

करावें वेदपारायेण । सांगावें जनासी पुराण ।
मायाब्रह्मीचें विवरण । साकल्य वदावें ॥ १९॥

वेदांचे पारायण करावे, लोकांना पुराण सांगावे, तसेच माया-ब्रह्म यासंबंधीचे सांगोपांग विवरण करावे. (१९)

ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें ।
गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच नेदावी ॥ २०॥

ब्राह्मणधर्माचे आदराने रक्षण करावे, भगवंताची उपासना भजनाद्वारे रक्षण करावी आणि आपली गुरुपरंपस निर्धाराने टिकवून धरावी. तीस बाधा येऊ देऊ नये. (२०)

करावें वैराग्यरक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण ।
परम दक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१॥

वैराग्याचे रक्षण करावे, ज्ञानाचे लक्षण सांभाळावे, जो अत्यंत सावध व विचारवंत वक्ता असतो, त्याला हे सर्व जमते. (२१)

कीर्तन ऐकतां संदेह पडे । सत्य समाधान तें उडे ।
नीतिन्यायसाधन मोडे । ऐसें न बोलावें ॥ २२॥

कीर्तन ऐकून श्रोत्यांच्या मनातसदेहउत्यनहोईल आणि खयेखरचत्याचेसमाधाननष्टहोईलतसेचनीतिन्याय व साधन यात बाधा येईल, असे वक्ताने काहीही बोलू नये. (२२)

सगुणकथा या नांव कीर्तन । अद्वैत म्हणिजे निरूपण ।
सगुण रक्षून निर्गुण । बोलत जावें ॥ २३॥

सगुण कथेलाच कीर्तन असे म्हणतात. अद्वैताचे प्रति- पादन किंवा स्पष्टीकरण याला निरूपण म्हणतात; कीर्तनकाराने सगुणाचे महत्त्व रधून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. (२३)

असो वक्त्रु त्वाचा अधिकार । अल्पास न घडे सत्योत्तर ।
वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४॥

जो अल्प बुद्धीचा आहे, ज्याला अनुभव नाही, वस्तूत्व नाही, सर्व प्रकारे जो उणा आहे त्याला वस्तूत्वाचा अधिकार नसतो. जो खरोखर अनुभवी असेल तोच वक्ता होऊ शकतो. (२४)

सकळ रक्षून ज्ञान सांगे । जेणें वेदज्ञा न भंगे ।
उत्तम सन्मार्ग लागे । प्राणीमात्रासी ॥ २५॥

असा अनुभवी वक्ता सर्वांचे रक्षण करून ज्ञानाचे निरूपण करतो. ते अशा प्रकारे करतो की, वेदाज्ञेचा भंग न होता प्राणिमात्रांनी सन्मार्गास प्रवृत्त व्हावे. (२५)

असो हें सकळ सांडून । करावें गुणानुवादकीर्तन ।
या नांव भगवद्भंजन । दुसरी भक्ती ॥ २६॥

असो. हे सर्व राहू द्यावे. भगवंताच्या गुणानुवादाचे वारंवार कथन, गायन करणे यालाच दुसरे भगवद्धजन किंवा कीर्तनभक्ती असे म्हणतात. (२६)

कीर्तनें माहादोष जाती । कीर्तनें होये उत्तमगती ।
कीर्तनें भगवत्प्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ २७॥

कीर्तनाने मोठे दोष नाहीसे होतात, कीर्तनाने उत्तम गती मिळते; एवढेच नव्हे तर कीर्तनाने भगवसाक्षी होते, यात तिळमात्र संदेह नाही. (२७)

कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होये सत्पात्र ।
हरिकीर्तनें प्राणीमात्र । सुसिळ होती ॥ २८॥

कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस सत्पात्र बनतो, हरिकीर्तनाने सर्व भाविक श्रोते सदाचारी बनतात. (२८)

कीर्तनें अवेग्रता घडे । कीर्तनें निश्चये सांपडे ।
कीर्तनें संदेह बुडे । श्रोतयांवक्तयांचा ॥ २९॥

कीर्तनाने एकाग्रता साधते, कीर्तनाने भगवसाक्षीचा निश्चय दृढ होतो, कीर्तनाने श्रोत्यांचे व वक्तांचे सर्व संशय नष्ट होतात. (२९)

सदा सर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण ।
तेणें नारद तोचि नारायेण । बोलिजेत आहे ॥ ३०॥

ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद सदासर्वदा हरिकीर्तन करीत असतात, म्हणून लोक त्यांना नारायणरूप मानतात. (३०)

म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तनें संतोषे परमात्मा ।
सकळ तीर्थें आणी जगदात्मा । हरिकीर्तनीं वसे ॥ ३१॥

म्हणून कीर्तनाचा महिमा अवर्णनीय आहे. कारण कीर्तनाने परमात्म्याला आनंद होतो. किंबहुना सर्व तीर्थे आणि भगवंत हरिकीर्तनात प्रत्यक्ष राहातात. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कीर्तनभजननिरूपणनाम समास दुसरा ॥ २॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कीर्तनभक्तिनाम’ समास दुसरा समाप्त.

समास तिसरा : नामस्मरणभक्ती

॥ श्रीराम ॥

मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन ।
आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ती ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, यापूर्वी जी सकळांना पावन करते त्या कीर्तनभक्तीचे वर्णन केले. आता विष्णूचे स्मरण ही तिसरी भक्ती सांगतो, ती ऐका. (१)

स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।
नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥

भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपावे. नामस्मरणानेच समाधान प्रास होते. (२)

नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं ।
नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥

नित्य नेमाने प्रातःकाळी, मध्याहकाळी, सायंकाळी एवढेच नव्हे तर सर्वकाळ नामस्मरण करीत असावे. (३)

सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां ।
नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥

सुखाचा प्रसंग असो वा दुःखाचा प्रसंग असो, मनात उद्वेग, चिंता असो अथवा मन आनंदरूप असो. कुठल्याही प्रसंगी नामस्मरणाशिवाय राहूच नये. (४)

हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥

आनंदाचा प्रसंग असो किंवा संकटाचा प्रसंग असो, पर्वकाळ असो वा प्रयाणकाळ असो, विश्रांतीची वेळ असो अथवा झोपेची वेळ असो, सर्वकाळ नामस्मरण करावे. (५)

कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।
आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥

एखादी समस्या निर्माण झालेली असो, काही अडचण असो वा संकट असो किंवा संसारातील नाना खटपटी, लटपटी चाललेल्या असोत किंवा मनात कशाच्या तरी योगाने चिंता किंवा चुटपुट लागलेली असो, सर्व अवस्थांमध्ये नामस्मरण करीतच राहावे. (६)

चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥

चालताना, बोलताना उद्योगधंदा करताना, खाताना, जेवताना, सुखी असताना किंवा नाना उपभोग घेतानाही नाम कधी विसरू नये. (७)

संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥

काळगतीप्रमाणे कधी संपत्ती प्रास होईल तर कधी विपत्ती प्रास होईल, पण लौकिक स्थिती कशीही असली तरी त्यात खंड पडू देऊ नये. (८)

वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।
उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥

एखादे वेळी वैभव, सामर्थ्य, सत्ता आदी सर्व तसेच इतर प्रापंचिक पदार्थ यांची सुबत्ता झाली तरी त्या उत्कट भाग्यश्रीचा उपभोग घेत असताही नामस्मरण कधी सोडू नये. (९)

आधीं आवदसा मग दसा । अथवा दसे‍उपरी आवदसा ।
प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥

आधी वाईट परिस्थिती होती, पण नंतर परिस्थिती सुधारली अथवा याचे उलट आधी चांगली परिस्थिती होती ती जाऊन वाईट परिस्थिती आली, यांपैकी कुठलाही प्रसंग असो, पण प्रसंगी नाम मात्र कधी सोडू नये. (१०)

नामें संकटें नासतीं । नामें विघ्नें निवारती ।
नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११॥

नामाच्या योगे संकटे नाश पावतात, विध्यांचे निवारण होते आणि नामस्मरणाने माणूस श्रेष्ठ पदास पोहोचतो. (११)

भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिर्ह्हो ब्राह्मणसमंध ।
मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२॥

निष्ठेने नामस्मरण केले असता भूत, पिशाच्च इत्यादी नाना बाधा, नाना कपटे व ब्रह्मसमंध तसेच नाना मंत्रप्रयोग, व नाना प्रकारची करणी इत्यादींची पीडा टळते. (१२)

नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटकें नासती ।
नामें होये उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३॥

नामाने विष बाधत नाही, चेटूक जादूटोणा इत्यादींचा प्रभाव पडत नाही. ती नाहीशी होतात आणि अंतकाळी नामाच्या योगे उत्तम गती प्रास होते. (१३)

बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृधाप्यकाळीं ।
सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४॥

बालपणी, तरुणपणी, संकयच्याकाळी किंवा वृद्धपणी सदासर्वकाळ तसेच अंतकाल आला असताही नामस्मरण चालूच असावे. (१४)

नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेसी विश्वेश्वर ।
वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५॥

नामाचा यथार्थ महिमा शंकरच जाणतात. तो विश्वेश्वर काशीत मरणाऱ्या जीवांना रामनामाचा उपदेश देऊन मुक्ती प्रास करून देतो. रामनामाच्या प्रभावानेच वाराणसी हे मुक्तिक्षेत्र ठरले आहे. (१५)

उफराट्या नामासाठीं । वाल्मिक तरला उठा‍उठी ।
भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥

उलट्या रामनामाच्या जपाने वाल्मीकीचा उद्धार झाला. एवढेच नव्हे तर भविष्यकाळी होणाऱ्या श्रीशमचरित्राचे वर्णन केले त्याचाच शतकोटी विस्तार झालेला आहे. (१६)

हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला ।
नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥

हरिनामाच्या योगेच नाना संकटंतून सुटका होऊन प्रहाद उद्धरून गेला आणि पापी अजामीळ नारायणाच्या नामस्मरणाने पावन झाला. (१७)

नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले ।
माहापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥

नामाच्या प्रभावाने समुद्रात पाषाण तरले. असंख्य भक्त रामनामामुळे उद्धरून गेले. अत्यंत महापापी होते, ते परम पवित्र बनले. (१८)

परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें ।
नामस्मरण करितां, येमें- । बाधिजेना ॥ १९॥

परमेश्वराची अनंत नामे आहेत. त्यातील एखाद्या नामाचे नित्यनेमाने प्रेमाने स्मरण केले असता माणूस उद्धरून जातो. नामस्मरणाच्या प्रभावाने यमयातना भोगाव्या लागत नाहीत. (१९)

सहस्रा नामामधें कोणी येक । म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्लोक । हो‍ईजे स्वयें ॥ २०॥

भगवंताच्या हजारो नामांपैकी कोणतेही एक नाम निष्ठेने घेत राहिल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होते. नामस्मरण केल्याने ते करणारा स्वत: पुण्यात्मा बनतो. (२०)

कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥

इतर काहीही साधना न करता स्वतः फक्त रामनामाचा अखंड जप जर कुणी करीत राहील, तर त्यामुळे भगवान चक्रपाणी अत्यंत संतुष्ट होतात आणि त्या भक्ताचा सर्व प्रकारे सांभाळ करतात. (२१)

नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर ।
माहादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२॥

जो मनुष्य निरंतर नामस्मरण करतो, त्याचे शरीरही त्या नामाच्या प्रभावाने पुण्यमय होऊन जाते. रामनामामुळे महादोषांचे उतुंग पर्वतही नाश पावतात. (२२)

अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला ।
हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥

नामाचा महिमा अगाध आहे. त्याचे संपूर्ण वर्णन करताच येणार नाही. नामामुळे अनेक लोकांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष चंद्रमौळी शकरानादेखील हलाहल विषाची बाधा झाली नाही. (२३)

चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर ।
जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४॥

नामाचा अधिकार चारी वर्णाच्या लोकांना आहे. नामस्मरणाच्या बाबतीत लहान, थोर हा भेद नाही. अगदी जड छ, अडाणी, मूर्ख माणसेही नामामुळे सुखाने पैलतीर गाठतात. (२४)

म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें ।
तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५॥

म्हणून अखंड नामस्मरण करीत राहावे व त्याचे रूप मनात आठवावे. ही तिसरी भक्ती होय. तिचे येथे यथार्थ वर्णन केले आहे, असे श्रीसमर्थ म्हणतात. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नामस्मरणभक्तिनिरूपणनाम समास तिसरा ॥ ३॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘नामस्मरणभक्तिनाम’ समास तिसरा समाप्त.

समास चौथा : पादसेवनभक्ती

॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । नामस्मरणाचें लक्षण ।
आतां ऐका पादसेवन । चौथी भक्ती ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात नामस्मरणभक्तीच्या लक्षणांचे निरूपण केले आता चौथी भक्ती जी पादसेवन तिचे लक्षण ऐका. (१)

पादसेवन तेंचि जाणावें । कायावाचामनोभावें ।
सद्गुaरूचे पाय सेवावे । सद्गणतिकारणें ॥ २॥

कायावाचामनोभावाने सद्‌गतिप्रासीसाठी श्रीसद्‌गुरूच्या चरणकमलांची सेवा करणे, ही पादसेवनभक्ती जाणावी. (२)

या नांव पादसेवन । सद्गुसरुपदीं अनन्यपण ।
निरसावया जन्ममरण । यातायाती ॥ ३॥

जन्ममरणाची यातायात कायमची चुकावी, म्हणून सद्‌गुरुचरणी अनन्य होणे यालाच पादसेवन म्हणतात. (३)

सद्गुरुकृपेविण कांहीं । भवतरणोपाव तों नाहीं ।
याकारणें लवलाहीं । सद्गुुरुपाय सेवावे ॥ ४॥

सद्‌गुरुकृपेशिवाय दुसरा काहीही भवतरणोपाय नाही हेजाणून घेऊन शक्य तितक्या लवकर श्रीसद्यरूंच्या चरणांची सेवा करू लागावे. (४)

सद्वस्तु दाखवी सद्गुसरु । सकळ सारासारविचारु ।
परब्रह्माचा निर्धारु । अंतरीं बाणे ॥ ५॥

श्री सद्‌गुरूच परमात्मवस्तूदाखवितात. सायससिवचार म्हणजे काय वगैरे सर्व कळून येते आणि परब्रह्माच्या स्वरूपासंबंधी निश्चय अंतःकरणात ठसतो. (५)

जे वस्तु दृष्टीस दिसेना । आणी मनास तेहि भासेना ।
संगत्यागेंविण ये ना । अनुभवासी ॥ ६॥

जी वस्तू डोळयांस दिसत नाही आणि मनानेही जी अनुमानता येत नाही, ती आत्मवस्तु संगाचा त्याग केल्याशिवाय अनुभवास येत नाही. (६)

अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागें अनुभव न दिसे ।
हें अनुभवी यासीच भासे । येरां गथागोवी ॥ ७॥

मी अनुभव घेतो, अशी वृत्ती जोपर्यंत असते, तोपर्यंत संगत्याग नसतो. ज्यावेळी संगत्याग घडतो तेव्हा अनुभव लक्षात येत नाही. द्वैत राहातच नाही. माझे हे बोलणे हे स्वानुभवीच जाणू शकतील इतरांना त्यात गोंधळ आहे असे वाटते. (७)

संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।
सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरूप ॥ ८॥

संगत्याग आणि आत्मनिवेदन, विदेहस्थिती आणि अलिप्तपणा, सहजस्थिती आणि उन्मनी म्हणजे मनातीतता, विज्ञान म्हणजेच स्वरूपानुभव ही सातही एकरूपच आहेत. (८)

याहिवेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें ।
सकळ कांहीं पादसेवनें । उमजों लागे ॥ ९॥

या स्थितीला आणखी नावेही आहेत. पण स्वरूपानुभवाचे समाधान व्यक्त करणारी ती खुणेची वचनेच असतात. हे सर्व काही केवळ श्री सद्‌गुरूंच्या चरणसेवनानेच समजू लागते. (९)

वेद वेदगर्भ वेदांत । सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत ।
अनुभव अनुर्वाच्य धादांत । सत्य वस्तु ॥ १०॥

वेद, वेदांचे रहस्य, वेदान्त, सिद्धांचा मार्ग, त्यातील रहस्य व त्यांचे सिद्धान्त यांचा अनुभव हा अवर्णनीय असला तरी तो सत्यवस्तू असल्याने प्रत्यक्षच असतो. (१०)

बहुधा अनुभवाचीं आंगें । सकळ कळती संतसंगें ।
चौथे भक्तीचे प्रसंगें । गोप्य तें प्रगटे ॥ ११॥

आत्मानुभवाची अशी अनेक अंगे आहेत. ती संतसंगाने संतसमागमात कळू लागतात. चौथ्या भक्तीचे वर्णन करण्याच्या प्रसंगाने परमार्थातील अनेक गुप्त रहस्ये ० होत आहेत. (११)

प्रगट वसोनि नसे । गोप्य असोनि भासे ।
भासाअभासाहून अनारिसे । गुरुगम्य मार्ग ॥ १२॥

परमात्यवस्तू प्रगट असूनही नसल्यासारखी वाटते व अदृश्य असूनही मनाला जाणवते. भास आणि अभासाच्या अतीत अशी ही परमात्मवस्तू गुरुगण्य मार्गानेच जाणता येते. (१२)

मार्ग होये परी अंतरिक्ष । जेथें सर्वहि पूर्वपक्ष ।
पाहों जातां अलक्ष । लक्षवेना ॥ १३॥

गुरुगण्य मार्ग हा आत्मारामाशी ऐक्य पावण्याचा मार्ग आहे. तेथे इतर तर्क इत्यादी पूर्वपक्षांप्रमाणे टिकू शकत नाहीत. कारण स्वस्वरूप मन, बुद्धी इंद्रियादींनी जाणता येण्यासारखे नाही. (१३)

लक्षें जयासी लक्षावें । ध्यानें जयासी ध्यावें ।
तें गे तेंचि आपण व्हावें । त्रिविधा प्रचिती ॥ १४॥

त्या वस्तूस लक्ष देऊन आतमध्ये पाहाण्याचा प्रयत्न करावा, ध्यान धरून त्यास जाणावयाचा प्रयत्न करावा. मग तसे करताना ती वस्तूच स्वतः आपणच होतो. शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती आणि आत्मप्रचीती ही त्रिविधा प्रचीती आहे. (१४)

असो हीं अनुभवाचीं द्वारें । कळती सारासारविचारें ।
सत्संगेंकरून सत्योत्तरें । प्रत्ययासि येतीं ॥ १५॥

असो. स्वस्वरूपानुभव प्रास करून घेण्याचे असे मार्ग आहेत. ते सागससिवचायने कव्यात व सत्संगाच्या योगे त्यांचा खरोखर अनुभव येतो. (१५)

सत्य पाहातां नाहीं असत्य । असत्य पाहातां नाहीं सत्य ।
सत्याअसत्याचें कृत्य । पाहाणारापासीं ॥ १६॥

परमात्मा सत्यस्वरूप आहे. त्याचा शोध घेऊ गेले की असत्याचा, मायिक वृष्टीचा लोप होतो. या उलट मायिक वृष्टीला खरे मानून त्यात गुरफटल्यावर सत्यस्वरूप परमात्मा दुरावतो. याप्रमाणे पाहणाऱ्यांच्या दृष्टीवर सत्य, असत्याची प्रचीती अवलंबून असते. (१६)

पाहाणार पाहाणें जया लागलें । तें तद्रूपत्वें प्राप्त जालें ।
तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७॥

पाहाणारा परमावर पाहाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो वेगळा उरतच नाही, तदूप होऊन जातो. असा तो जेव्हा तदूप होतो, तेव्हाच त्याच्या अंगी समाधान बाणते. (१७)

नाना समाधानें पाहातां । बाणती सद्गुवरु करितां ।
सद्गुसरुविण सर्वथा । सन्मार्ग नसे ॥ १८॥

समाधान अनेक प्रकारे होत असले तरी सद्‌गुरूंच्या कृपेनेच अंगी बाणते. त्यांच्याशिवाय परमात्यप्राक्षीचा दुसस मार्गच नाही. (१८)

प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेपें विद्याअभ्यास ।
अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९॥

नाना प्रयोग केले, ज्ञान, भक्ती, कर्मयोगादी अनेक साधने केली, निरनिराळ्या प्रकारे जप-तपादी सायास केले मोठ्या प्रयताने अनेकविद्यांचा अभ्यास केल, तरी गुरुकृपेमुळे जी प्राप्ती होते, ती दुसऱ्या कशानेही होऊ शकत नाही. (१९)

जें अभ्यासें अभ्यासितां न ये । जें साधनें असाध्य होये ।
तें हें सद्गुbरुविण काये । उमजों जाणे ॥ २०॥

जे अभ्यासाने प्रास होऊ शकत नाही, जे साधनांनी असाध्य आहे, त्याचे ज्ञान सद्‌गुरूशिवाय कसे काय होणार ? (२०)

याकारणें ज्ञानमार्ग- । कळाया, धरावा सत्संग ।
सत्संगेंविण प्रसंग । बोलोंचि नये ॥ २१॥

म्हणून ज्ञानमार्ग कळण्यासाठी सत्संग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सत्संगाखेरीज या गोष्टी बोलूसुद्धा नयेत. (२१)

सेवावे सद्गु रूचे चरण । या नांव पादसेवन ।
चौथे भक्तीचें लक्षण । तें हें निरोपिलें ॥ २२॥

सद्‌गुरूंच्या चरणांची सेवा याचेच नाव पादसेवन. याप्रमाणे चौथ्या भक्तीचे लक्षण येथे वर्णन केले आहे. (२२)

देव ब्राह्मण माहानुभाव । सत्पात्र भजनाचे ठाव ।
ऐसिये ठाईं सद्भााव । दृढ धरावा ॥ २३॥

देव, ब्राह्मण, आत्मज्ञानी संत व अत्यंत सात्त्विक सज्जन ही सेवेस योग्य स्थाने आहेत. त्यांच्या ठिकाणी दृढ सद्‌भाव धरावा. (२३)

हें प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें ।
परंतु सद्गुतरुपाय सेवणें । या नांव पादसेवन ॥ २४॥

हे जे मी सांगितले ते प्रवृत्तीचे बोलणे असून व्यवहार व परंपरा यांचे रक्षण व्हावे म्हणून सांगितले. परंतु वास्तविक सद्‌गुरु-चरणाची सेवा हीच खरी पादसेवन भक्ती होय. (२४)

पादसेवन चौथी भक्ती । पावन करितसे त्रिजगतीं ।
जयेकरितां सायोज्यमुक्ती । साधकास होये ॥ २५॥

ही पादसेवन नावाची चौथी भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी असून या भक्तीच्या योगेच साधकाला सायुज्यमुक्ती प्रास होते. (२५)

म्हणौनि थोराहून थोर । चौथे भक्तीचा निर्धार ।
जयेकरितां पैलपार । बहुत प्राणी पावती ॥ २६॥

म्हणून ही भक्ती श्रेष्ठांतही श्रेष्ठ आहे असे मी निर्धारपूर्वक सांगतो. तिच्या योगेच अनेक लोक या संसारसागराच्या पैलतीरास पोहोचले आहेत. (२६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पादसेवनभक्तिनिरूपणनाम समास चवथा ॥ ४॥

इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘पादसेवनभक्तिनाम’ समास चौथा समाप्त.

समास पाचवा : अर्चनभक्ती

॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । चौथे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १॥

श्रीसमर्थ म्हणतात की, मागल्या समासात चौथ्या भक्तीचे लक्षण वर्णन करून सांगितले. आता सावध होऊन पाचवी भक्ती कशी असते ते ऐका. (१)

पांचवी भक्ती तें आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन ।
शास्त्रोक्त पूजाविधान । केलें पाहिजे ॥ २॥

अर्चन ही पाचवी भक्ती असून अर्चन म्हणजे देवतार्चन करणे, पण ते शास्त्रोक्त विधीप्रमाणे यथासांग केले पाहिजे. (२)

नाना आसनें उपकर्णें । वस्त्रें आळंकार भूषणें ।
मानसपूजा मूर्तिध्यानें । या नांव पांचवी भक्ती ॥ ३॥

नाना प्रकारची आसने, पूजेची उपकरणी, वस्त्रे, अलंकार- भूषणे यांनी पूजा करावी. मनात मूर्तीचे ध्यान करावे आणि तिची मानसपूजा करावी. ही पाचवी भक्ती आहे. (३)

देवब्राह्मणाग्नीपूजन । साधुसंतातीतपूजन ।
इति महानुभाव गाइत्रीपूजन । या नांव पांचवी भक्ती ॥ ४॥

देव, ब्राह्मण, अग्नी, साधु-संत, अतिथिअभ्यागत यांचे पूजन तसेच यती, ब्रह्मज्ञानी, संत, गाय, यांचे पूजन ही पण पाचवी भक्ती जाणावी. (४)

धातुपाषाणमृत्तिकापूजन । चित्र लेप सत्पात्रपूजन ।
आपले गृहींचें देवतार्चन । या नांव पांचवी भक्ती ॥ ५॥

धातू मृत्तिका, पाषाण यांच्या मूर्ती तसेच तसबिरी व गंधाच्या लेपाने भिंतीवर काढलेल्या उपासनामूर्ती किंवा संत यांची पूजा करावी. तसेच आपल्या घरातील देवाचीही पूजा करावी. याला पाचवी भक्ती म्हणतात. (५)

सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित ।
लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ॥ ६॥

सात किंवा नऊ शुभचिहे असलेले दगड शाळिग्राम, चक्रांकित दगडाचे तुकडे, शिवलिंगे, सूर्यकांत, चंद्रकांत मणी, शंकराचे बाण, तांदळे व नर्मदेतील गोटे (६)

भैरव भगवती मल्लारी । मुंज्या नृसिंह बनशंकरी ।
नाग नाणी नानापरी । पंचायेत्नपूजा ॥ ७॥

तसेच भैरव, भगवती (देवी), मल्हारी, मुंज्या, नृसिंह, बनशंकरी, नाग, निरनिराळ्या प्रकारची देवतांचा छाप असलेली नाणी, पंचायतनाची म्हणजे गणेश, सूर्य, शक्ती, शिव व विष्णू या मुख्य पाच देवतांची पूजा, ही अर्चनभक्ती होय. (७)

गणेशशारदाविठलमूर्ती । रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती ।
श्रीरंगहनुमंतगरुडमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८॥

गणेश, शारदा, विठ्ठल यांच्या मूर्ती, तसेच रंगनाथ, जगनाथ, नटराज यांच्या मूर्ती, श्रीरंग, हनुमंत, गरुड यांच्या मूर्तीचे पूजन करावे. (८)

मत्छकूर्मवर्ह्हावमूर्ती । नृसिंहवामनभार्गवमूर्ती ।
रामकृष्णहयग्रीवमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ९॥

मक्य, कूर्म, वयह, नृसिंह, वामन, भार्गव यांच्या मूर्ती, राम, कृष्ण, हयग्रीव यांच्या मूर्तीचीही पूजा करावी. (९)

केशवनारायणमाधवमूर्ती । गोविंदविष्णुमदसूदनमूर्ती ।
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती । रुषीकेश पद्मनाभि ॥ १०॥

केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर हृषीकेश, पद्यनाभ, (१०)

दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती । प्रद्युम्नानुरधपुरुषोत्तममूर्ती ।
अधोक्षजनारसिंहाच्युतमूर्ती । जनार्दन आणी उपेंद्र ॥ ११॥

दामोदर संकर्षण, वासुदेव, प्रद्युस्त, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन व उपेंद्र यांच्या मूर्ती, (११)

हरिहरांच्या अनंत मूर्ती । भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती ।
शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२॥

तसेच हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत, जगदात्मा, जगदीश यांच्या मूर्ती आणि शिवशक्तीच्या बहुविध मूर्ती देवतार्चनी पूजाच्या. (१२)

अश्वत्थनारायेण सूर्यनारायेण । लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण ।
श्रीहरीनारायण आदिनारायण । शेषशाई परमात्मा ॥ १३॥
ऐश्या परमेश्वराच्या मूर्ती । पाहों जातां उदंड असती ।
त्यांचें आर्चन करावें, भक्ती- । पांचवी ऐसी ॥ १४॥

अश्वत्यनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनाशयण, त्रिमल्लनारायण, श्रीहरिनासयण, आदिनारायण, शेषशायी, परमात्मा अशा परमेश्वराच्या मूर्ती दिसून येतात. त्यांचे अर्चन करणे ही पाचवी भक्तीच आहे. (१३ – १४)

याहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये अनुक्रम ।
उत्तम अथवा मध्यम । करीत जावें ॥ १५॥

याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म जसे चालत आले असतील त्यांचे त्याप्रमाणेच पालन कमवे. त्यांचा अनुक्रम सोडू नये. उत्तम अथवा मध्यम कसेही असोत आपण ते करीत जावे. (१५)

जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी ।
पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६॥

जाखमाता, मायसणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी यांची पूजा कुलधर्माप्रमाणे करावी. (१६)

नाना तीर्थांक्षत्रांस जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें ।
नाना उपचारीं आर्चावें । परमेश्वरासी ॥ १७॥

नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जावे, तेथे त्या त्या देवतेचे पूजन करावे. नाना प्रकारच्या उपचारांनी परमेश्वराची अर्चना करावी. (१७)

पंचामृतें गंधाक्षतें । पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें ।
धूपदीप असंख्यातें । नीरांजनें कर्पुराचीं ॥ १८॥
नाना खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबोलप्रकार ।
दक्षणा नाना आळंकार । दिव्यांबरें वनमाळा ॥ १९॥
सिबिका छत्रें सुखासनें । माहि मेघडंब्रें सूर्यापानें ।
दिंड्या पताका निशाणें । टाळ घोळ मृदांग ॥ २०॥
नाना वाद्यें नाना उत्साव । नाना भक्तसमुदाव ।
गाती हरिदास सद्भाव- । लागला भगवंतीं ॥ २१॥

पंचामृते, गंधाक्षता, नाना प्रकारची फुले सुवासिक द्रव्ये, अनेक प्रकारचे धूप-दीप, असंख्य नीरांजने, कर्पूरार्ती, नाना खाद्ये, सुंदर नैवेद्य, नाना प्रकारची फळे व विड्याचे नाना प्रकार दक्षिणा, नाना अलंकार दिव्य अशी वस्त्रे, वनमाला, पालख्या, छत्रे, सुखासने, पाल्यीवर धरतात त्या उंच छत्र्या, अब्दागिरी, दिंड्या, पताका, निशाणे, जळ, घोळ, मृदुंग, अनेक प्रकारची वाद्ये देवाला अर्पण करावी. अनेक प्रकारचे उत्सव, त्यात एकत्रित होणारे भक्तांचे समुदाय आणि हरिदास, भगवंताचे गुणानुवाद भगवंतांच्या भक्तीत रंगून गाऊ लागतात. त्यामुळे आनंद उचंबळून येतो. (१८ – २१)

वापी कूप सरोवरें । नाना देवाळयें सिखरें ।
राजांगणें मनोहरें । वृंदावनें भुयरीं ॥ २२॥

पाण्याचे आठ विहिरी, सरोवरे नाना देवालये, त्यांची शिखरे मोठी अंगणे, सुंदर वृंदावने व तळघरे (२२)

मठ मंड्या धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।
नाना उपकर्णें नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामुग्री ॥ २३॥

मठ मोठमोठ्या माड्या, अथवा यात्रेच्या वेळी बाजारहाट मांडण्यासाठी केलेल्या मंडई, धर्मशाळा, तसेच देवद्वारी ओवऱ्या, नाना उपकरणी, नक्षत्रमाला, नाना वस्त्रे वगैरे सामग्री, (२३)

नाना पडदे मंडप चांदोवे । नाना रत्नघोष लोंबती बरवे ।
नाना देवाळईं समर्पावे । हस्थि घोडे शक्कटें ॥ २४॥

अनेक पडदे, चांदवे, मंडप, लोंबणारे मोत्यांचे रत्नांचे घोस, तसेच हत्ती, घोडे, रथ, गाड्या निरनिराळ्या देवालयांना अर्पण करावेत. (२४)

आळंकार आणि आळंकारपात्रें । द्रव्य आणी द्रव्यपात्रें ।
अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें । नाना प्रकारीचीं ॥ २५॥

अलंकार आणि ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य आणि ते ठेवण्याच्या पेट्या, अनोदक आणि त्यासाठी लागणारी ताटे, वाड्या, भांडी, पातेली, हंडे, कळशा वगैरे अनेक प्रकारची भांडी, देवाला अर्पण करावीत. (२५)

वनें उपवनें पुष्पवाटिका । तापस्यांच्या पर्णकुटिका ।
ऐसी पूजा जगन्नायका । येथासांग समर्पावी ॥ २६॥

वने-उपवने, पुष्पवाटिका, ल्लागा, फळबागा, तपस्वी लोकांना राहण्यासाठी झोपड्या असे सर्व समर्पण भावाने जगनायकाला यथासांग अर्पण करून याप्रकारे त्याची पूजा करावी. (२६)

शुक शारिका मयोरें । बदकें चक्रवाकें चकोरें ।
कोकिळा चितळें सामरें । देवाळईं समर्पावीं ॥ २७॥

पोपट सारिका, मोर बदके, चक्रवाक चकोर कोकिळा वगैरे पक्षी आणि चितळ सांबर याप्रकारची हरणे देवालयाला अर्पण करावी. (२७)

सुगंधमृगें आणी मार्जरें । गाई म्हैसी वृषभ वानरें ।
नाना पदार्थ आणी लेंकुरें । देवाळईं समर्पावीं ॥ २८॥

त्याचप्रमाणे कस्तुरीमृग, मांजरे, गाई, म्हशी, बैल, वानरे ही जनावरे आणि इतर नाना पदार्थ आणि लेकरे देवालयाला अर्पण करावीत. (२८)

काया वाचा आणी मनें । चित्तें वित्तें जीवें प्राणें ।
सद्भाaवें भगवंत आर्चनें । या नांव आर्चनभक्ती ॥ २९॥

काया, वाचा, मन, चित्त, वित्त म्हणजे पैसा अडका, जीव व प्राण थोडक्यात म्हणजे आपले सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण करून अंतःकरणापासून त्याची पूजा करणे, याचे नाव अर्चनभक्ती आहे. (२९)

ऐसेंचि सद्गुभरूचें भजन- । करून, असावें अनन्य ।
या नांव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३०॥

अशाच प्रकारे श्री सद्‌गुरूची पूजा करून त्यांना अनन्यभावाने शरण जाणे, याचेही नाव भगवद्‌भजन असून तीही पाचवी भक्तीच आहे. (३०)

ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी ।
मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ॥ ३१॥

अशा रीतीने बाह्योपचारांनी चांगली पूजा घडू शकली नाही तरी मानसपूजा तरी अगत्य करावी. (३१)

मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें ।
मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२॥

मनाने भगवंताचे पूजन करावे. मनाने कलून विविध उपचार आदी सर्व काही त्यास प्रेमाने अर्पण करावे. मानसपूजेचे लक्षण हे असे आहे. (३२)

जें जें आपणांस पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे ।
येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ॥ ३३॥

आपल्याला देवाला जे जे अर्पण करावे अशी इच्छा असले, ते ते सर्व मनाने कलून त्यांच्या चरणी अर्पण करावे. या प्रकारे मानसपूजा अवश्य करावी. (३३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
र्चनभक्तिनाम समास पंचवा ॥ ५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘अर्चनभक्तिनाम’ समास पाचवा समाप्त.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *