|| जय गुरू माणिक ||
तेलंगणांतील मोगडमपल्ली गांवच्या एका वैश्यकुलांत व्यंकम्माचा जन्म झाला. बाल्यावस्थेतच विवाह झाले आणि थोड्याच दिवसांत दुर्भाग्यवश तिला वैधव्य प्राप्त झाले. व्यंकम्माचे आई-वडील आपल्या शोकग्रस्त कन्येची दुर्दशा पाहून अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी श्रीप्रभूंचे दर्शन घेऊन, त्यांच्या समोर आपली व्यथा मांडून या समस्येचे निदान करण्याचे ठरविले. श्रीप्रभु तेंव्हां मैलारक्षेत्रांत वास करून होते, म्हणून व्यंकम्माच्या परिजनांनी मैलारांस जाऊन प्रभूंचे दर्शन घेण्याचे ठरविले. वाटेत एक दुर्घटना घडून त्यांत व्यंकम्माच्या परिवारातील सर्वलोक मरण पावले. अशा विकट परिस्थितीतही व्यंकम्मा सतत श्रीप्रभुनामाचा जप करीत राहिली. व्यंकम्माच्या त्या उत्कट भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीप्रभु स्वयं तिथे प्रगट झाले आणि व्यंकम्माचें प्राण वाचविले. या प्रसंगामुळे व्यंकम्माचे चित्त प्रभूंच्या चरणीं कायमचें स्थिरावले. त्या काळीं प्रभूंचे वास्तव्य मैलारच्या मूळलिंगाच्या देवालयांत होते. व्यंकम्मानी श्रीप्रभुचरणीं सर्वस्व समर्पित केले व ती प्रभूंच्या सेवेंत राहू लागली. प्रभूंनी अनेक प्रकारें तिची सत्त्व परीक्षा पाहिली आणि अनन्यभावानें शरण आलेल्या व्यंकम्मास अनुग्रहित केले. श्रीगुरूंच्या चरणीं निस्सीम भक्ती आणि कठोर साधनेच्या जोरावर व्यंकम्मांनी महान् आध्यात्मिक उत्कर्ष साधले. श्रीगुरूंच्या पूर्णकृपेनें देवी व्यंकम्मा परमपदाला प्राप्त झाली. एवढेच नव्हें तर साक्षात् प्रभूंच्या कनिष्ठ बंधूना आत्मज्ञानाचा उपदेश व्यंकम्मांनीच केला. श्रावण वद्य त्रयोदशी सन् 1862 रोजी पहाटे देवी व्यंकम्मांनी ‘श्रीमाणिक जय माणिक’ हें भजन करीत आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला आणि महासमाधीत लीन झाली. व्यंकम्माच्या मृत्यूची वार्ता ऐकून तिचे वैश्यकुलीन कुटुंबीय तिची अंत्यक्रिया करण्यासाठी माणिकनगरी जमले. व्यंकम्माच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान नसणारें तिचे संबंधी दाह कर्म करण्यासाठी जेव्हां पुढे सरसावले आणि त्यांनी तिच्या पार्थिव देहांस स्पर्श केला तेव्हां, व्यंकम्माच्या देहातून ॐकार ध्वनी निघत असल्याचे पाहून सर्व मंडळी आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहूं लागली. ही वार्ता जेंव्हां श्रीप्रभूंनी ऐकली तेंव्हां साक्षात् श्रीप्रभु तातडीनें त्या ठिकाणीं आले. प्रभु येतांच व्यंकम्मा जणूं झोपेतून जागी झाल्यासारखी उठली, तिनें प्रभूंचें चरण धरून शेवटचा नमस्कार केला व पुनः प्रभूंच्या समक्ष पद्मासन घालून महासमाधीत लीन झाली. श्रीप्रभूंनी स्वत:च्या देखरेखीत योगिनी व्यंकम्माच्या समाधीची विधी शास्त्रोक्तरित्या विद्वान् पंडितांकडून विधिवत् पूर्ण करवून घेतली. पुढे श्रीमन्मार्तंड माणिकप्रभु महाराजांनी योगिनी व्यंकम्माच्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव सर्वांना करवून ही भगवान् दत्तात्रेयाची आदिशक्ती मधुमती श्यामला असल्याचे पटवून दिले. श्रीमन्मार्तंड माणिकप्रभु महाराजांनी महामाया देवी व्यंकम्माच्या स्तुतिपर अनेक सुंदर पदांची रचना करून तिचे माहात्म्य वर्णिले आहे. भगवती व्यंकम्माचे समाधिमंदिर हें माणिकनगरचे शक्तिपीठ होय. देवी व्यंकम्मा मधुमती श्यामलाच्या रूपांत प्रभुभक्तांची मनोकामना पूर्ण करण्यांस तत्पर असून तिच्या असीम अनुकंपेने प्रभुभक्तांच्या आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक तापांचें निरसन होत असल्याची प्रचीति नित्य येत असतें. प्रतिवर्षी श्रावण वद्य त्रयोदशीस माणिकनगरांत भगवती व्यंकम्माची आराधना संपन्न होत असतें. प्रतिवर्षी शारदीय नवरात्रांत देवी व्यंकम्माच्या देवालयांत मधुमती श्यामला पंचात्रोत्सवाचें आयोजन अत्यंत भव्य व दिव्य प्रमाणांत साजरा होतो.