*!!! उर्मिला !!!*

रामायण

राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा शयनकक्ष जणूं पहिल्या रात्री सारखा सजवला.आपल्या मंचकावर बसून उर्मिला लक्ष्मणाची वाट पाहत होती.कैक वर्षाच्या एकाकी जिवनानंतर आज त्यांचे मिलन घडणार होते.तिला आठवले लग्नानंतरच्या पहिल्या रात्री दोघांमधेही मिलनाचा किती आवेग,उत्सुकता उत्साह होती मिलनाची?आज मात्र ती स्तब्ध होती. वास्तविक तिला त्याच्याशी भरभरुन बोलायचे होते.इतके दिवसांचे सुखदुःख जाणून घ्यायचे होते.पण तिची जीभ रेटत नव्हती.आज इतक्या वर्षांनी लक्ष्मणाला इतके जवळून बघून त्याचं जीर्ण,कृश व काळवंडलेला चेहरा पाहून तिला संकोच वाटला.मधल्या १४ वर्षाच्या प्रदीर्घ काळा चा अडसर दूर होत नव्हता. तिला कितीतरी सांगायचे होते, ऐकायचे,जाणून घ्यायचे होते,पण शब्दच मुके झाले.तिचे सुजलेले डोळे बघून लक्ष्मणाने हळुवारपणे तिचा हात हाती घेत विचारले,तूं रडत होतीस?त्या स्पर्शा सरशी तिच्या तनामनाला घुमारे फुटले. त्याचा स्पर्श अनुभवून कितीतरी काळ लोटला होता.त्याच्या हाताचा खरखरीत स्पर्श तिला जाणवला.त्याचे तळहात तिने अलगद हातात घेतले.कठोर परिश्रमामुळे हाताला घट्टे पडले होते. लाकुड तोडणे,पाणी आणणे,शिकारी साठी धनुष्यबाण चालवणं असे अविरत कष्ट केले होते या हातांनी.इंद्रजित आणि इतरांचा वध करतांना या हातांनी दया माया दाखवली नव्हती,त्याच हातांनी सीतेच्या अग्निपरीक्षेसाठी लाकडं गोळा केली होती.मारीच राक्षसाच्या मागावर गेलेला राम परत येईपर्यंत कुटीत सीतेच्या रक्षणार्थ थांबू देण्याची विनवनी याच हातांनी केली होती.सीतेने केलेली निर्भत्सना,वेदनेने विव्हळत याच हातांच्या मुठी आवळल्या होत्या.तरी विवेक धारण करुन तिच्या रक्षणार्थ कुटी भोवती रेखा याच हाताने ओढली होती. गेल्या १४ वर्षातील घटनांच जाळं उर्मिले ला या श्रमलेल्या हातावर दिसले.

त्याच्या स्पर्शाने ती भानावर आली.भरुन आलेले डोळे त्याला दिसू नये, मिलणाच्या या क्षणी कुठलीही दुःखद आठवण नको म्हणून किंचित मान वळवली.त्याने मिठीत घेतल्यावर ती हळुहळु सावरली.कितीतरी वेळ मिठीत तसेच विसावले होते.त्याने तिला अवधी दिला.सौख्य,शांती,समाधानाची अनुभुती दोघांनाही येत होती. त्याच्या छातीवरचे प्रत्येक व्रण अनोखी गाथा होती.त्या व्रणां मधेच खोल नवी ताजी जखम दिसल्या वर,त्यावर ओठ टेकवून वेदना टिपून घेण्याचा प्रयत्न करीत होती.त्याने आवेगाने तिला मिठीत घट्ट आवळले. कांही वेळातच त्याला गाढ झोप लागली. पण उर्मिला…? निद्रा तिच्यापासून कोसो दूर होती. आणि तिच्या नजरेसमोरुन चलचित्रा प्रमाणे बालपणापासूनचे सारे प्रसंग सरकू लागले….तिला आठवला बालपणाचा एक प्रसंग..सीता,उर्मिला,मांडवीश्रुतकीर्ती नांव अवघड असल्यामुळे कीर्ती म्हटल्या जात होते.तर ह्या चार बहिणी लपंडाव खेळत होत्या.उर्मिला,मांडवी नऊ वर्षा च्या,श्रुतकीर्ती सात व सीता उर्मिलेपेक्षा एक वर्षाने मोठी होती.नेहमीप्रमाणे खेळा तील गंमत जाऊन,मोठी बहिण सीतेला शोधायचं कठीण काम समोर आलं.सीते चं हे असं नेहमीचच!ती अश्या कांही अवघड जागा शोधत असे की,तीला शोधण्यातच सारा खेळण्याचा वेळ वाया जात असे,सीतेचा शोध घेत उर्मिला व्हरांडे,विस्तीर्ण कौटुंबिक वाटीकेतील कोपरा नी कोपरा शोधला,पाय दुखायला लागले,पण शोधण्यात खंड नव्हता. अनेक आशंकांनी मन हैराण झाले.उर्मी तिला कांहीही झालं नसणार,तूं उगाच काळजी करतेस,मांडवीच्या स्वराने उर्मिला भानावर आली.

अखेर वरच्या कक्षात जिथे जाण्यास पित्याची मनाई होती,भले त्यांचा रोष पत्करण्याची तयारी होती. श्रुतीला माता पित्यांना सांगायला पाठवून मांडवीसह उर्मिला त्या निर्बंधीत कक्षात सीतेला शोधण्यास पोहोचल्या….

उर्मिला आणि मांडवी त्या पवित्र निर्बंधीत कक्षाजवळ पोहचून मोठ्या प्रयासाने दारं उघडली.संपूर्ण कक्षात सीता दिसली नाही.मांडवी म्हणाली,जीथे आपल्या दोघींना दार उघडण्यास प्रयास पडले,तिथे एकटी सीता दार कसं उघडू शकेल?चल!आपल्याला इथे कुणी बघण्याआधी निघून जाऊ या..नाही ती इथेच असायला हवी!उर्मिला आर्त स्वरात सीतेऽऽ हाक मारत म्हणाली,कुठे आहेस?समोर येना.. नको ना अंत पाहूस कक्षाच्या टोकाला एका उंचवट्याव सिंहासन होते.आणि त्याच्या बाजूने एका ठेंगण्या चौरंगावर असलेल्या एका भव्य लोह संदुकीत डोकावणारी सीता दिसली. सीताऽऽ उर्मिला आनंदोशयाने तिला मिठी मारायला सरसावली,पण समोरचं दृष्य बघताच आवाक् होऊन जागीच थबकली.सीतेच्या नाजूक हातात मोठं शिवधनुष्य लिलया पकडून त्या संदुकीत कांहीतरी शोधत असतांना दिसली.

मी या पेटीत लपण्यासाठी उतरली असतां माझा चेंडु निसटून यांत पडला. त्या भव्य पेटीत एका कोपर्‍यात असले ला चेंडू दिसल्यावर चेंडु उचलून ते अवाढव्य धनुष्य तिने सहजतेने पेटीत ठेवलेले बघून दोघीही अतिशय आश्चर्य चकीत झाल्या.त्या बाहेर जाण्यासाठी वळल्यावर त्यांना तात,माता व काकाश्रीं ना बघीतल्यावर आतां आपली खैर नाही या भितीने त्या गर्भगळीत झाल्या.पण कांही क्षणापूर्वी जो आदर मांडवीच्या चेहर्‍यावर दिसला तोच त्या तिघांच्याही चेहर्‍यावर दिसला.तातांनी सीतेसमोर येऊन अत्यंत नम्रपणे मान झुकवली. त्यांचच अनुकरण माता व काकाश्रींनी केले.

सकाळचे आन्हिकं उरकवून उर्मिला चित्र काढण्यांत मग्न असतांनाच अति उत्साहाने मांडवीने येऊन सांगीतले विश्वामित्र ऋषींसह अयोध्येचे दोन युवक आलेले असून काकाश्रींनी त्यांची राहण्या ची व्यवस्था विशेष अतिथीगृहात केली आहे.चौघी बहिणींमधे कुठेही द्वेष, आकस नसे.मनातील सारे स्पष्टपणे ऐकमेकींशी बोलत असत.उर्मिला म्हणाली,त्यात काय विशेष?दरवर्षीच तातश्री मिथिलेत तत्वज्ञानाच्या चर्चा घडवून आणतात,आणि आतां तर सीतेचे स्वयंवर सप्ताहावर आले.सीतेचा विवाह समय जवळ आला होता.कोणतीही वधू उत्तेजीत होते पण सीता मात्र अपवाद होती.त्या चौघीही वेद,उपनिषद,संगीत, कला साहित्य,राजकारण यात पारंगत असल्या तरी राजप्रसादाबाहेर जात नव्हत्या.बंदिस्त राजकन्या!तातांसमवेत देशभरातील विविध चर्चासत्र आणि धार्मिक सत्रांना उपस्थित असत,पण तेवढ्याने उर्मिलेचे समाधान होत नसे. आजवर कानावर पडलेल्या विविध स्थळांना भेट देण्याची तिला तीव्र लालसा होती.सीतेनंंतर आपल्याही विवाहाचा विचार होईल.पण जीवनाचा सहचर शोधण्यापेक्षा अधिक ज्ञानप्राप्तीकडे तिचा कल होता.पण सामाजिक रीती नुसार तिला विवाह करावाच लागणार होता.

सीते तुला तुझ्या विवाहाचा आनंद नाही वाटत?नक्कीच आहे.पुढे काय आणि कसे घडणार हे माहित असल्यावर उत्तेजित कां व्हाव?जो व्यक्ती शिवधनुष्य भंग करेल त्याच्या गळ्यात माळ घालाय ची हे ठरलेल आहे ना?शिवधनुष्य भंग? वीस हात(साडे आठ फुट) लांबीचं ते धनुष्य उचलायला ३०० लोक व ज्या हातगाडीवर ठेवले ते ढकलायला तेवढेच लागतात.ते अवजड धनुष्य तूं लहानपणी सहजतया उचलस म्हणूनच एखादा अलौकिक पुरुषानेच ज्याला तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे त्याला त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवावी लागेल.जे धनुष्य साधं सरकवलं जाईल की नाही ही शंका!म्हणजे सीतेशी विवाहबध्द होणारी व्यक्ती अलौकिकच असेल.सीता म्हणाली, उर्मिला तुझ्या प्रश्नाचे उत्तर तूंच दिलेस,म्हणूनच मी शांत आहे,शिवाय तातांश्रीवर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणतीही गोष्ट पटकन स्विकार करणे हा सीतेचा स्वभाव !उलट उर्मिला प्रत्येक गोष्ट चिकित्सेने बघत असे. तातश्री नेहमी म्हणत,सीता देवदूत आहे. विदेही नगरीचा राजा शीरध्वज जनक आणि पत्नी सुनयना या निपुत्रीकांना यज्ञ विधी करण्यासाठी जमीन नांगरतांना सीता सांपडली होती.त्या दोघांनी तिचा प्रथम कन्या म्हणून स्विकार केला होता. तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक जनकाने तिचे नांव सीता ठेवले.धरणीमातेने दिलेला तो आशिर्वाद होता.सीता भूमी प्रमाणेच उमदी,खोलवर पाळंमुळं रुजले ली आणि जिवनदायिनी होती.त्यानंतर वर्षभराने उर्मिलेचा जन्म झाला.ती सीते पेक्षा पूर्णतः वेगळी होती तरी त्यांच्यात दृढ नातेसंबंध निर्माण झाले होते.त्यामुळे त्यांचे प्रेम टिकून होते. मांडवी आणि श्रुतीकीर्ती ह्या वाराणसी नरेश कुशध्वजाच्या कन्या! त्यांच्या मातेच्या निधनानंतर त्यांची जबाबदारी राजा शीरध्वज(जनक)नी आपल्याकडे घेतली.तेवढ्यात मांडवीच्या आवाजाने उर्मिलेची तंद्री भंग झाली. ती म्हणाली,विश्वामित्रांसोबत आलेले जेष्ठ राजपुत्र राम असून कनिष्ठ राजपुत्राचं नांव लक्ष्मण आहे.ऋषी विश्वामित्र? उर्मिलेची उत्सुकता ताणल्या गेली.ब्रम्हर्षी ब्रम्ह,अंतिम सत्य आणि सर्वोत्तम पवित्र ब्रम्हज्ञान मिळवून ऋषीमंडळांत विशेष स्थान मिळवलेले विश्वामित्र सहजासहजी कुठे जात नसत की भेटत नसत.ते पूर्वा श्रमीचे राजा कौशिक होते.एका प्रसंगी अयोध्येचे कुलगुरु वसिष्ठांशी संघर्ष झाला असतां वसिष्ठ स्वबळावर राजा कौशिकच्या सशस्र

सेनेची दाणादाण उडवलेली पाहून अपमानित झालेल्या राजा कौशिकने त्याग करुन परम आध्यात्मिक शोधार्थ आपले जीवन सार्थकी लावले.वसिष्ठमुमींहून स्वतःला मोठ करण्याच्या ध्यासाने विश्वामित्र नाव धारण करुन कठोर तपश्चर्या केलि आणि ब्रम्हर्षीपदाला पोहोचले.विश्वामित्र ब्रम्हर्षीपदाला पोहोचले तरी मूळ स्वभाव बदलू शकले नाही. आजही त्यांचा स्वभाव एखाद्या चक्रवर्ती राजाला शोभेल असाच आढ्यतेखोर आहे.कितीही बलाढ्य राजा असला तरी त्यांच्यासमोर त्याचा थरकाप होतो.अशा या ब्रम्हर्षीचं इथे येण्याचे प्रयोजन काय असेल तेही दोन राजपुत्रांसह?उर्मिलेला प्रश्न पडला.बोलकी मांडवी म्हणाली, दंडकारण्यात ते तप करीत असतांना असूर त्यांच्या तपात वारंवार विघ्न आणत.ताटीका व तिचे दोन पुत्र सुबाहू व मारीच..ते इतके सामर्थ्यशाली होते की, त्यांना कुणीच ठार करुं शकत नव्हते. विश्वामित्रांनी अयोध्या नरेश दशरथाकडे रामलक्ष्मणाची मागणी केली व या दोन तरुण राजपुत्रांनी ताटीका व सुबाहूला चुटकीसरशी संपवले.मारीच मात्र निसटला.

पण ते राजकुमार इथे कां आलेत? तीव्र स्वरांत उर्मिलेने विचारले?या तापट ऋषीच्या प्रभावाने तात अडचणीत आले का?की, मिथिला अयोध्येत कांही बेबनाव झाला की,राजपुत्रांच्या रुपात तातांना धमकी मिळते का? नेमकी समस्या काय? उर्मिलेला समजेना.तसं कांहीच नाही उर्मि,ते सहज मनोरंजना साठी व तातांची भेट घ्यावी या उद्देशाने आलेले आहेत.काकाश्री(जनक) यज्ञ करीत आहे त्याचे अगत्याचे निमंत्रण सर्व ऋषीमुनींना गेले असल्यामुळे विश्वामित्र आले व ते दोन तरुण, मिथिला नगरी.. कीर्ती म्हणाली,सीता स्वयंवरासाठी तर नसेल आले?हीच शंका उर्मिलेला आली. सीतेकडे पाहिले तर तिच्याही मनात हेच विचार घोळत असावेत. गेल्या कांही दिवसांपासून सीता गप्प गप्पच होती.त्यादिवशी सुध्दा मंदिरात गेलेल्या सीतेची उर्मिला वाट बघत होती.कांही वेळाने कावर्‍या बावर्‍या अवस्थेत सीता प्रवेशल्यावर,कुठे गेली होतीस?कधीची वाट बघते आहे. मला मातेला मदत करायचीय,येणार्‍या ऋषींच्या स्वागतासाठी तातांबरोबर लेखन करायचे,तिच्या बोलण्याकडे सीते चे लक्ष नाहीसे पाहून तिचे हात हातात घेत उर्मिलाने विचारल्यावर सीता म्हणाली आज पुन्हा भेटले.कोण? अयोध्याकुमार राम,सोबत लक्ष्मणही होते एका भेटीतच अशी अवस्था होऊ शकते इतकं आकर्षण वाटू शकते?एका सप्ताहाने विवाह आहे,तेव्हा त्रयस्थाला भेटणे योग्य आहे का? दुसर्‍या दिवशी सीता,उर्मिला,मांडवी व श्रुती मंदिरात पोहोचल्यावर मनोभावे देवीसमोर नतमस्तक झाल्या. परतल्या तर अयोध्येचे दोन्ही राजकुमार समोर उभे!दुर्लक्ष करुन जावे तर शिष्टाचाराला अनुसरुन नसल्यामुळे त्यांना अभिवादन करीत उर्मिला म्हणाली ह्या माझ्या चुलत बहिणी मांडवी व श्रुतकीर्ती,मी उर्मिला आणि ही माझी मोठी बहीण सीता!देखणा राम उंच, सुदृढ असून मार्दवता,सहजता होती. लक्ष्मणही देखणा होता पण त्याच्यात आढ्यता दिसत होती.त्याने उर्मिलाकडे दृष्टीक्षेप टाकल्यावर तिला अवघडल्या सारखे झाले.उर्मिलेने सीतेचा हात धरुन जवळ जवळ ओढतच चौघी बहिणी प्रासादाकडे निघाल्या.कक्षात पोहोचल्या वर उर्मिला म्हणाली,सीते एवढी अस्वस्थ नको होऊस.रामावर तुझा जीव जडला तर तोच तुझा पती होईल.सीते, रामाला मिथिलेत आणण्यामागे विश्वामित्राचे तसेच प्रयोजन असणार!तोच शिवधनुष्य भंग करेल.तोच तुझा राजकुमार बरं का? खरचं तो होईल माझा? सीता लवकरच दुसर्‍या वेगळ्या जगात जाणार,म्हणजे उर्मिलेचा विरह! उर्मिला धाकटी असली तरी,सतत सीते ला सांभाळून घेत होती.तिच्यालेखी सीते चं अस्तित्व कायम होतं.उर्मिला सीतेची जीवनरेखा,आत्मसखी होती. जनक आणि सुनयना सीता सांपड ल्यावर तिला अतिशय लाडात वाढवल, घडवल!कधीच सीतेला रागावले नव्हते. उलट उर्मिलेला नेहमीच बोलणी खावी लागत,पण हसतमुखाने उर्मिला सारं निभावून नेई.जनकाची कन्या म्हणून सीता जानकी!खरं तर हा सन्मान उर्मिले ला मिळायला हवा होता,तरी उर्मिलेला कधी खंत वाटली नाही.आपली लहान बहिण उर्मिलेवर होत असलेला अन्याय पाहून सीतेला वाईट वाटायचे.वयाने लहान असूनही सीतेची प्रत्येक जबाबदारी उर्मिलेने खंबीरपणे निभावली होती.एखादी वाघीण आपल्या पिलाचं रक्षण करते तसंच!मार्गदर्शक,मदतनीस, मनःप्रिया,सांत्वनकर्ती प्रत्येक भूमिका उर्मिलेने अगदी चपखलतेने निभावली होती.मातापित्याचे प्रेम असले तरी,सीते च्या मनात उर्मिलेविषयी सुमधुर स्मृतींना वेगळेच स्थान होते.अशा सुह्रदयी उर्मिले पासून आपण दूर होऊ हा विचारच सीतेला सहन होत नव्हता.विवाहआनंदाहून वियोगाचा विचार अधिक दुःख देत होता. जेष्ठराजपुत्र रामाच्या प्रेमात सीता जशी आकंठ बुडली,तस आपलं लक्ष्मणा बाबतीत तर होत नाही ना?स्वतःच उर्मिला दचकली.स्वयंवरासाठी राजसभा सजवण्यात आली.कक्षाच्या मध्यभागी शिवधनुष्य ठेवण्यात आले.परशुरामांनी हे शिवधनुष्य जनकराजाच्या घराण्याकडे कित्येक पिढ्यांपूर्वी सोपवलं होतं.उर्मिले च्या वाडवडिलांनी अभेद्य पेटीत मोठ्या आदराने बंद करुन जतन केलं होतं.त्या कक्षात सर्वांना प्रवेश निषिध्द होता. लहानपणी मात्र आधी सीता व नंतर तिच्या शोधार्थ उर्मिलेने प्रवेश केला होता. १० वर्षाच्या नाजूक सीतेने हे अवजड धनुष्य कसं पेललं असेल हा ऊलगडा उर्मिलेला कधीच झाला नाही.इतक्या वर्षानंतरही त्या स्मृतीने उर्मिला थरारली. नंतर मातापित्यांनी सीतेला नतमस्तक होऊन केलेले आदरयुक्त अभिवादन!सीता कोणी विशेष व्यक्ती आहे कां?कां तिच्याठायी विशेष शक्ती होती?हा प्रश्न उर्मिलेला सातत्याने भेडसावित होता. उर्मिलेच्या मातापित्यांनी सीतेला विशेष दक्षतेने वागवल्यामुळे,ती पोटची पोर नसल्यामुळे तिच्यावर अधिक माया करत असेल असा समज उर्मिलेने करुन घेतला होता.त्यांच प्रेम वात्सल्याहून जास्त भक्तीस्वरुप होत,कदाचित म्हणूनच उर्मिलेला तिच्याबद्दल द्वेष,आकस, असूया कधी वाटली नाही.

राजा शीरध्वज(जनक) लोकप्रिय व बलाढ्य राजा होता.प्रजा त्याच्या प्रेम पूर्वक वागण्याने संतुष्ट होती.राजा-राणी ने आपल्या कन्यांमधे राजाधिकाराची भावना रुजवण्यापेक्षा माणुसकीची ज्योत सतत तेवत ठेवली होती.जनक केवळ राजाच नव्हता तर कीर्तीवंत याज्ञवल्क्य ऋषींचे ते आवडते शिष्य देखील होते.याच मुनींनी शुल्क युजुर्वेदाचं लेखन केलंं होतं.अष्टवक्र ऋषीकडून जनकांनी शिक्षण घेतले होते.आत्मा आणि स्वचं खरं रुपाविषयीचं ज्ञान त्यांना इथेच मिळाले होते.स्वतः जनक राजर्षी होते.वेद आणि शास्रांमधे त्यांना उत्तम गती होती.अध्यात्माचं सखोल ज्ञान होतं. माणुसकी आणि उदारतेची अचूक सांगड त्यांनी घातली होती.आतांही एकीकडे यज्ञ सुरु असतांना दुसरीकडे सीता स्वयंंवर आयोजित केले होते.सर्व थोर आणि शूरवीर राजे,महाराजे स्वयंवरा साठी सजलेल्या कक्षेत उपस्थित होते. या कक्षात मुलींना यायला मनाई होती. पण आज स्वयंवरच्या निमित्याने चौघीही बहिणी उपस्थित होत्या.सीताप्राप्तीच्या आशेने देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील राष्र्टातूनही अनेक शूरवीर राजे उपस्थित होते त्यात लंकानरेश रावणही होता. त्याच्या उपस्थितीमुळे सभेत क्षोम निर्माण झाला होता.तो जनकराजाजवळ बसून कांहीतरी गंभीर चर्चा करीत होता.

स्वयंवरासाठी आलेल्या सर्व राजां ची इत्थंभूत माहिती चौकस मांडवीकडून सर्व बहिणींना मिळाली होती.वेदांवर प्रभुत्व असलेला रावण संगीत विशारद, वीणावादनांत तरबेज,याशिवाय ज्योतिष्य,वास्तुशास्र,राज्यशास्र,आयुर्वेद या विषयांचे ज्ञान पण दांडगे होते.स्वतः च्या प्रसिध्देची जाणिव त्याच्या वागण्या बोलण्यातून सहज लक्षात येत होते.त्यांनं शिवधनुष्याला प्रत्यंचा चढविण्याचं आव्हान स्विकारले होते.सीतेने घेतलेला दीर्घश्वास बघून उर्मिलेने धीर दिला.त्याच वेळी सीतेची दृष्टी रामाकडे व उर्मिलेची लक्ष्मणाकडे गेली…. सीता वरवर जरी शांत वाटत असली तरी,तीने उर्मिलेचा हात घट्ट पकडून ठेवला होता.तेवढ्यात रावण उठला.स्वयंवरात आगंतुक असला तरी इतरांना त्याचं आगमन आवडले नव्हते तरी राजशिष्टाचाराला अनुसरुन त्याची हावभगत केली होती.त्याच्या इच्छेनुसार धनुष्याला प्रत्यंचा चढविण्याचा पहिला मान त्याला देण्यात आला.अत्यंत उर्मट पणे पुढे आलेल्या रावणाने राजा जनक व सीतेला नम्रपणे हात जोडून अभिवाद न केले.नंतर डोळे मिटून नतमस्तक होत मंत्रोच्चार करुं लागला.तो स्वतः कट्टर शिवभक्त असल्यामुळे नक्कीच तो शिवा ची आराधना करीत असावा असे उर्मिले ला वाटले.प्रार्थना होताच,दीर्घ श्वास घेत त्याने धनुष्याला हात घातला पण,धनुष्य तसूभरही हललं नाही.जोर देत वारंवार उचलण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ! त्या वेळी राजसभेतील सर्व राजांपेक्षा तो अधिक बलाढ्य होता.जमीनीवर आडवं ठेवलेलं धनुष्य उचलण्यासाठी रावणा सारखा धिप्पाड राजा गुडघ्यावर बसलेला बघून उर्मिलेला हसू आवरणे कठीण जात होते.तिने सभामंडपांत सर्वी कडे दृष्टी टाकली असतां बहूतांशी सारेच गोंधळलेले दिसले.रामाच्या कपाळावर किचिंत अढी होती.विश्वामित्रांच्या मुखा वर मात्र स्मित होते.लक्ष्मण हसू दाबण्या चा प्रयत्न करीत होता.त्याची हसतमुद्रा बघून त्याची आकर्षकता,स्नेहशितलता,

नजरेत भरत होती.उर्मिला एकटक त्याच्याकडे बघत असलेले पाहून मांडवी ने तिला हलकेच धक्का दिल्यावर ती भानावर आली. रावण आतां संतापाने खदखदत होता.आटोकाट प्रयत्न करुनही शिव धनुष्य तसूभरही हललं नाही.सुरुवातीला त्राग्याने सभोवताली नजर फिरवीत जे शब्द उच्चारले होते त्याचा डौल क्षणार्धात कोसळल्याचे लक्षात आले.तो म्हणाला,हे पवित्र शिवधनुष्य जागेवरुनही हलवू शकलो नाही,कदाचित माझ्या शिव भक्तीतच उणीव राहीलं असावं.पण लक्षात ठेवा,हे शिवधनुष्य माझेकडूनच हललं नाही तर कुणाकडूनच हलणार नाही.जनक राजा!अशाने तुझी कन्या जन्मभर अविवाहित राहील.तरी मी दुर्लक्ष करुन विवाह करण्यास तयार आहे.त्याच्या दर्पोक्तीमुळे उर्मिलेच्या मनी क्षोम उसळला,श्वास घ्यायलाही ती विसरली.आपल्या तातांचा,बहिणीचा उपमर्द करण्याचं धाडस त्याला झालच कसं?या संतप्त विचाराने तिने मातेकडे कटाक्ष टाकला तर,भय चिंतेने राणीचा चेहरा उतरला तर पिता शांत होते.

हे लंकेश्वरा!जराही विचलित न होता,राजा जनक म्हणाले,रुद्र धनुष्याला आपण प्रत्यंचा चढवण्यांत अयशस्वी झाल्याने मलाही खेद आहे.आपणही कठोर शिवभक्त आहांत.आतां स्वयंवरा चा पण मागे घेणे केवळ अशक्य आहे. माझी कन्या जन्मभर अविविवाहित राहिल ही चिंता नका बाळगु.तीच्याशी विवाह करणारा पुरुष असामान्य असेल. धनुष्यावर प्रत्यंचा चढविणार्‍या पुरुषाची मी वाट पाहीन. जनकराजाचा अहंकार डिवचण्या च्या दृष्टीने त्याने दुसरी कन्या उर्मिलेची मागणी केली.हे पाहून संतापाने लक्ष्मण कांही बोलणार तोच रामांनी त्याला आवर घातला.सीतेकडे बघत रावण म्हणाला,केवळ तुझ्यामुळे झालेला अपमान मी कधीही विसरणार नाही असे म्हणून दाणदाण पाय आपटत त्याने सभा त्याग केला.बलाढ्य रावणाचा पराभव पाहून,मग पुढे येण्याचे भाडस कोणीही केले नाही.पराभव मान्य करत बरेचसे राजे निघून गेले. उरलेल्या राजांना आसन ग्रहण करण्याची विनंती करत,राजा जनक म्हणाले,आपण पुन्हा सुरुवात करु या. उपस्थितांपैकी जवळ जवळ ३० राजे, राजपुत्रांनी प्रयास केला,पण धनुष्य हलले नाही.अपमानित व पराभूत होऊन प्रत्येकजणं जागेवर बसला.राजसभेतील वातावरण तापूं लागले.उद्वेग आणि संताप आवरत नव्हता.त्वेषाने प्रश्न केला गेला.या अशक्यप्राय पणाने सीता मिळत नसेल तर तुझी दुसरी कन्या किंवा पुतणी शी विवाह करण्यास तयार आहोत.असा अशक्यप्राय पण ठेवून आमची क्षमता, स्वाभिमान,आदर या सर्वांचा अपमान करण्यास निमंत्रित केले कां?आपल्या पित्याची अगतिक अवस्था बघून स्वतः साठी व बहिणींसाठी आपणच लढावे हा विचार मनांत येतो तोच संतप्त लक्ष्मण सभेस सन्मुख होऊन धारदार आवाजांत गरजला,राजकन्यांचा अपमान करण्याचा परवाणा तुम्हाला कोणी दिला?

लक्ष्मण पुढे म्हणाला,या स्वयंवर मंडपांत अजून एक उपवर पुरुष हजर आहे.अयोध्यानरेश दशरथांचा जेष्ठ पुत्र राम! राम उठले.विश्वामित्रांना प्रणिपात करुन आशिर्वाद घेतला.जनकांसमोर नत मस्तक होऊन अनुमती मागीतली, राणी ला वंदन व राजकन्यांना अभिवादन करुन धनुष्याच्या दिशेने दमदार पावले टाकली.प्रथम धनुष्याला नमस्कार केला व श्रध्दापूर्वक धनुष्याला मध्यभागी पकडून अलगद हाती घेऊन प्रत्यंचा चढवली.आणि धनुष्याचे दोन तुकडे झाले.सभेत आनंद पसरला.राणी सुनयनाने औक्षणचे तबक पुढे केले.राणी च्या सर्व चिंता क्षणांत विरघळल्या.सांपडलेल्या मुलीला पक्षपाती वागणूक दिली असा ठपका येऊ नये म्हणून सीतेला अतिशय लाडात वाढवले. उर्मिलेचा हक्क डावलल्यामुळे सुरवाती ला ती सीतेचा द्वेष करायची,पण सुनयना ने तिला खरे कारण समजावून सांगीत ल्या दिवसांपासून उर्मिलाने आपल्या बालपणाचा कायमचा निरोप घेतला. व सीता स्पर्धक नसून फक्त आणि फक्त बहिण आहे हे जेमतेम ७ वर्षाची असणारी उर्मिला कधीच विसरली नाही. सीतेने देखण्या रामाच्या गळ्यात वरमाला घालतांच जयघोष होत असतां, गडगडाटी आवाज करत एक ऋषी प्रवेश दारातून आंत प्रवेश केला.इतक्या लांबूनही उर्मिलेला ऋषींच्या मुखावर प्रचंड संताप पाहून क्षणांत सर्वांना भस्म करतील असे वाटले.एका हातात धनुष्य दुसर्‍या हातात परजलेला परशू हे रुप बघून सारे गर्भगळीत झाले.अत्यंत विनम्र होत,श्रध्दापूर्वक राजा जनक म्हणाले, ऋषीवर परशुराम मी आपले स्वागत करतो.क्षोम पावलेली व्यक्ती परशुराम आहे हे कळतांच उर्मिलेचा धीर सुटला.ते ते चिरंजीव असून त्यांना पराजित करणे केवळ अशक्यच!ते ब्रम्हक्षत्रिय होते. प्रत्यक्ष शिवाने प्रसन्न होऊन परशू प्रदान केला होता.त्यावरुन त्यांना परशुराम या नावाने ओळखल्या जात.कार्तवीर्य अर्जुनाने त्यांचे पिता जमदग्नी मुनींची निर्घूण हत्या केली म्हणून २१ वेळा क्षत्रियांच्या २१ पिढ्यांचा वंशच्छेद केला होता.

जनकराजाकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाले,हे शिवधनुष्य कोणी भंग केले?आणि या शिवधनुष्याचे दोन तुकडे? हे मला शिवाकडून प्राप्त झालेले धनुष्य तुझ्या पुर्वजांना सुरक्षित सांभाळण्याची जबाबदारीवर सोपवले होते आणि आज मी काय पाहतो?कोण आहे तो?महामुनी!मी अपराधी आहे. जनक लिनतेने म्हणाले.माझी कन्या सीते ला योग्य वर मिळण्याच्या हेतूने मी या पवित्र शिवधनुष्याचा उपयोग केला.परंतु हा पण पूर्ण करण्यात कुणालाही यश मिळालं नाही.महापराक्रमी रावणसुध्दा पराजित झाला.अयोध्येचा राजपुत्र रामा ने हा पण जिंकला.मुनीवर!सीता लहान असतांना,जीथे हे धनुष्य उचलायला शेकडो लोकांची मदत घ्यावी लागते,तेच धनुष्य सीतेने एका हाताने लिलया उचलले होते.तो प्रसंग शुभशकुन मानुन धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याचा पण स्वयंवरासाठी ठेवला.

तेवढ्यात लक्ष्मण पुढे येऊन ऋषीं समोर नतमस्तक होत म्हणाला,तो असामान्य पुरुष माझा जेष्ठ भ्राता राम आहे.जे धनुष्य इतरांना तसूभरही हलवतां आले नाही ते एकट्या रामाने सहज उचललं,मात्र प्रत्यंंचा चढवतांना त्याचे दोन तुकडे झाले.कदाचित ते जीर्ण एवढं ऐकताच ऋषींचा संताप पराकोटीला गेला.आपल्या परशुवर पकड घट्ट केल्याची उर्मिलाने बघितले. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन,या मंगल प्रसंगी रक्तपात होण्याची शक्यता, व लक्ष्मणाचा शिरच्छेद करण्यासही हे संतप्त ऋषी मागेपुढे पाहणार नाही..ती स्वस्थ बसू शकत नव्हती.अनामिक भया ने उर्मिलेच्या मनांत ठाण मांडलं.या जीवन मरणाच्या क्षणी लक्ष्मणावर असलेल्या प्रेमाची तिला जाणीव झाली. ती मनांतून कितीही घाबरलेली असली तरी प्रेमासाठी ती ठामपणे परशुरामां समोर हात जोडून प्रणाम करीत म्हणाली मुनीवर आपल्या आगमनाने आम्हा सर्वां ना शुभाशीष प्राप्त झाले.कृपया आसन ग्रहण करावे.आणि खाली वाकून चरण स्पर्श केला.अनाहुतपणे आशिर्शाद दिला अखंड सौभाग्यवती भव! आशिर्वादाचा अर्थ लक्षात आल्यावर ऋषीचा क्रोध आणि पाजळलेला परशू पासून लक्ष्मण वाचला.

लक्ष्मणाला ऋषी म्हणाले,या पवित्र धनुष्याचा उल्लेख तू निर्बुध्दपणे कसा करुं धजावलास?माझ्या या परशूने क्षणांत तुझं मस्तक धडावेगळं….आणि परशू लक्ष्मणावर उगारला,पण तेवढ्यात उर्मिलेला दिलेल्या आशिर्वादाची आठवण झाली.तेवढ्यात राम पुढे येत म्हणाले, हे महामुनी!तुमच्या क्रोधाचे कारण मी आहे.माझ्या निष्काळजीने हे धनुष्य भंंग झाले,पण त्याचवेळी मी पण जिंकला.क्षमा करावी.तेवढ्यात विश्वामित्र समोर येऊन म्हणाले, हे पौत्रा! तूं किर्तीवंत आहे.माझ्या बहिणीचा पुत्र माझा भाचा जमदग्नीच्या वधाचा सूड घेण्यासाठी तूं सर्व क्षत्रियांचा नाश केला आणि त्या कृतीच्या परिमार्जनार्थ तपस्या केलीस.या तरुण राजपुत्रांचा वध करुन काय मिळवणार? आवर स्वतःला… दोन्ही हात जोडून परशुराम म्हणाले,मातामह!या राजपुत्रांना तुम्ही दैवीबल आणि आदिबल ही दिव्यास्र शिकवलीत.तत्वज्ञान आणि धर्माचं प्रगत ज्ञान दिलं.ताटका आणि सुबाहू सारख्या क्रूर राक्षसांचा विनाश यांच्या हातून घडविला.तुमचं त्यांना अभय आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर खरेच राम सर्वश्रेष्ठ आणि धनुष्यभंग करण्याइतपत अद्वितिय आहे तर,माझे पिता जमदग्नी ना प्रत्यक्ष ळिष्णूंनी दिलेल्या विष्णूंच्या धनुष्याला प्रत्यंचा चढविण्याचं आव्हान मी रामाला देतो.ही त्याची बलाची आणि कौशल्याची परीक्षा असेल.वास्तुशिल्प आकाराला आणणार्‍या विश्वकर्माने दोन हुबेहुब धनुष्याची जोडी निर्माण केली होती.त्यापैकी एक त्याने शिवाला व दुसरं विष्णुला दिलं होत.

मुनीवर आपले आव्हान स्विकारार्य आहे.आणि रामाने त्यांच्या हातातील धनुष्य घेऊन,त्यावर प्रत्यंचा चढवली व त्यांच्या ह्रदयाचा नेम धरुन विचारले,सांगा आतां काय करु?हा बाण तुमचा प्राण घेऊ शकतो.परशुराम स्तब्ध! नतमस्तक होत गुडघ्यावर बसून त्यांनी रामाला प्रणाम केला.संताप जाऊन चेहर्‍यावर नम्रता व भक्तीभाव आला. तुम्ही कोण आहात समजलं प्रभू.तुम्ही माझे उत्तराधिकारी आहात.आजवरची माझी सारी तपस्या तुम्हाला अर्पन करुन पुन्हा महेंद्र पर्वतावर जाऊन तपश्चर्येला सुरुवात करतो.तुमच्या बाणाने माझ्या आजवरच्या तपःशक्तीचा वेध घ्या.माझं तपःसामर्थ्य तुम्हाला प्राप्त होवो असं म्हणत त्यांनी रामाला भक्तीभावाने प्रदक्षिणा घातली व आले तसे निघून गेले रामाने आकाशाच्या दिशेने बाण सोडला. ढग इतस्ततः विखुरले.विजांचा कडकडाट झाला. हे दृष्य पाहून सर्व उपस्थित निःस्तब्ध झालेत.स्वतःला सावरत जनक राजाने राम-सीतेच्या विवाहाची घोषणा केली.सर्वत्र आनंद पसरला.नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून उर्मिला अजून सावरली नव्हती.लक्ष्मणाचा जीव वाचव ण्याच्या नादात तिच्या भावना उघड झाल्या होत्या.एकमेकांना वाटणार्‍या प्रेमाचं प्रदर्शन झालं होतं.अबोलपणे हे नातं त्यांनी स्विकारलं होतं.

जनकराजांनी ताबडतोब अयोध्येत दूत पाठवला.आणि विश्वामित्र आणि मिथिलेचे राजगुरु शतानंद यांनी मिळून विवाहाचा उत्तर फाल्गुन नक्षत्राचा सुमुहुर्त निश्चित केला.जेमतेम पंधरवाडा हाती होता. सीता दुखावल्या स्वरांत उर्मिलेला म्हणाली,तू लक्ष्मणावर अनुरक्त आहेस हे कां लपवलेस?मी रामांबद्दल भरभरुन बोलत होते आणि तूऽऽ? नाही गं!तसं कांहीच नाही.मलाच खात्री नव्हती.ठीक आहे.बरं तातांना सांगु का मी?तुझा विरह होणार म्हणून मी फार दुःखी होते.आतां दोघीही एकत्रीत राहिलो की,यापेक्षा दुसरा आनंद कोणता असेल?उर्मिलेला सीतेला नाराज कराय ची इच्छा नव्हती.लक्ष्मणाच्या मनात काय आहे हे कुठे तिला माहित होते?राम आणि लक्ष्मणाच्या स्वभावांत किती फरक आहे?राम सौम्य,मैत्रीपूर्ण वागणारा तर लक्ष्मण आढ्यतेखोर,उर्मिला आक्रमक,तर सीता सौम्य याच अहंकारामुळे दोघांनीही आपापले प्रेम व्यक्त केले नव्हते.

लक्ष्मण असं कां वागत होते?त्यांच्या नजरेतील वाचलेले भाव चुकीचे होते का?अशा व्यक्तीच्या प्रेमात पडलीच कशी?त्यांच प्रेम तरी आहे ना?तसं नसतं तर स्वयंवरदिनीची त्यांची ती नजर? रावणाने केलेला अपमान,त्यावेळचा संताप?तसेच इतर राजपुत्रांनी तीची इच्छा व्यक्त केली तेव्हाही मदतीला धावून आले..हे प्रेम नव्हते का?कां ते मनाविरुध्द प्रेमात पडले?

दुसर्‍या दिवशी सकाळी सीता, मांडवी व श्रुती मंदिरांत गेल्या.उर्मिलेला उशीर झाल्याने ती लगबगीने उपवनाच्या दाट झाडीपर्यंत आली तोच तिला सीता येतांना दिसली.दूरुन राम लक्ष्मण!अचानक लक्ष्मण थबकले आणि इशार्‍या ने रामालाही थांबायला सांगून त्यांच्या दिशेने येणार्‍या सीतेच्या ह्रदयाचा वेध घेऊन बाण सोडला.हे बघून उर्मिला जागीच स्तब्ध झाली.संताप,भीती आणि शोकामुळे तोंडातून शब्द निघाला नाही. छातीतून निघणार्‍या रक्तस्रावाला कसंबसं दाबून धरत सीता खाली कोसळली.हे बघतांच उर्मिला किंचाळत तिच्या दिशेने धावली,तोच लक्ष्मणाने तिला थांबायला सांगीतले,पण त्यांच्या कडे दुर्लक्ष करुन,जखमी सीतेच्या दिशेने धावत निघाली असतां,लक्ष्मणाचा विळखा तिच्याभोवती पडला.चिडून म्हणाले,ऐकू येत नाही?जाऊ नको म्हटल्यावर?रक्ताच्या थारोळ्यात पडले ल्या सीतेला बघून अत्यंत तिरस्काराने म्हणाली,असं कां केले?कां सीतेला ठार केलेत?काय बिघडवलं होतं तिने तुमचे? आणि अचानक उर्मिलेला लक्ष्मणाच्या कमरेला लटकवलेला खंजिर दिसला.तो काढून त्यांचेवर वार करण्यास सुरुवात करणार त्यापूर्वीच लक्ष्मणाने तिचे मनगट आवळले की,हातातील खंजिर गळून पडला.तिने जळजळीत नजरेने त्यांचेकडे बघीतले.तिला खुप जोराने ओरडावेसे वाटत होते,पण कंठच शुष्क झाला.डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

अतिशय हळुवारपणे लक्ष्मण म्हणाले,चल तुला खरा प्रकार दाखवतो असे म्हणून उर्मिलेला घेऊन लक्ष्मण सीते जवळ घेऊन गेले.सांग तू कोण आहेस? उत्तर देण्याऐवजी तिला हसलेले बघून, तात्काळ लक्ष्मणाने तिच्या पाठीत बाण मारला.ती जोरांत कळवळून ओरडली. तेवढ्यात सीता,मांडवी,श्रुती येतांना दिसल्या.लक्ष्मणाने पुढे येण्यापासून सर्वांना थांबवले.समोर घडलेली घटना बघून राम दिग्मुढ झालेत.सीतेचे रुप धारण केलेल्या त्या मरणोन्मुख व्यक्ती कडे सर्वजण आवाक होऊन पाहत असतांनाच तो मुळ रुपात आला.तेवढ्या त रक्षकांसह राजा जनक येऊन पोहोचले त्याला ओळखून जनक म्हणाले….

अरेऽ हा तर बाणासूर राक्षस!मी सीतेचे स्वयंवर करुं नये असा निरोप याने धाडला होता.काल परत विवाह करु नये म्हणून निरोप आला होता.मी पोकळ धमकी समजून दुर्लक्ष केले.इथे येण्याचे साहस करेल असे वाटले नव्हते.बोलणे सुरु असतांनाच,बाणासुराने सर्वाचे लक्ष चुकवून दाट झाडीत झेप घेतली.त्याला पलायण कां करु दिलेस?संबंधीत व्यक्ती ला सांगावे म्हणून…कांही व्यक्तींना मात्र त्यांचा आरोप उर्मिलेला जाणवला.ती धुसमसत लक्ष्मण गेल्या दिशेने पाहू लागली.त्यांच्या मिठीचा उबदार स्पर्श, त्यातून जाणवलेली आश्वासकता,तिच्या नावाचा अपभ्रंश करुन,मिला म्हणून मारलेली हाक…या सर्वांचा अर्थ काय होता?काय सांगू पाहत होते?आपण बहिणीसाठी त्यांना ठार मारायला तयार होती,त्यांच्या ऐवजी तिने बहिणीची निवड केली असे तर त्यांना सुचवायचे नव्हते ना? या घटनेनंतर सहा दिवसांनी जनकराजांनी पाठवलेला दूत निरोप घेऊन आला.चारही कन्यांसह सत्वर बोलावल्याचा…यात कांहीच वावगं नव्हत.राजसभेत निर्णय घेतांना जनक राजा नेहमीच आपली पत्नी,कन्या, धाकटा भाऊ,पुतण्याशी चर्चा करीत असे परंपरेने चालत आलेल्या या पध्दतीचा प्रत्येक जण सन्मान राखत असे. राम-सीतेच्या होणार्‍या विवाहा बद्दल राजा दशरथाने आनंद व्यक्त करुन इतर तीन पुत्रांसाठी तिन्ही मुलींचा हात मागीतला.अयोध्येचे चारही राजपुत्र शौर्य, बुध्दीमान,दयाळू विशेष म्हणजे इतरांचा आदर करणारे असल्यामुळे आपल्या तिन्ही कन्यांच्या संमतीने जनकराजाने स्विकृती दिली.दोन्ही राज्यांत प्रजाजनां च्या उत्साहाला उधाण आले. पित्याच्या सांगण्यानुसार विवाहापूर्वी विश्वामित्रांचा आशिर्वाद घेण्यास त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्या. ते उर्मिलाला मिष्कीलपणे म्हणाले,तू ज्या पध्दतीने परशुरामांकडून आशिर्वाद प्राप्त केलास,ते लक्षात घेता मला अगदी तोलून मापून शब्द उच्चारावे लागेल.तूं अतिशय शूर आहेस.तू जी इच्छा करशील ते प्राप्त करण्याचे धैर्य तुझ्यात आहे.तरीसुध्दा एक लक्षात ठेव,पुढचा प्रवास सोपा नसेल.चौघीं बहीणीमधे तूं सर्वाधिक खंबीर आहेस,तू जे पेरशील ते प्राप्त न होता,तुला जे प्राप्त होईल तेच तूं पेरशील.उर्मिलेला त्यांचे बोलणे उमगले नाही.तेच पुढे म्हणाले,मी मिथिलेत एका विशिष्ट उद्देशाने आलोय!अयोध्येच्या चार राजपुत्रांशी तुम्हा चौघां बहिणींचा विवाह व्हावा या माझ्या योजनेमागे योग्य कारण आहे.वेळ आली की,कळेलच.त्यांच्या गुढ बोलण्याने उर्मिलेला वाटले,काळ आणि दैवाऐवजी घटनाक्रमच त्यांच्या हातात असावा.हा त्यांचा आशिर्वाद की,पुढे घडू पाहणार्‍या घटनांची नांदी? उर्मिला अंधश्रध्दाळू किंवा रुढी परंपरेवर अनाठायी विश्वास ठेवणारी नव्हती.तत्वज्ञानाची चांगली जाण होती तीला.मनांत आले संतप्त देवाला प्रसन्न करण्यासाठी एखादा यज्ञ करावा का? तिचे मन वाचल्यागत विश्वामित्र म्हणाले, बाळा,तुझे मन यज्ञकांडात रमणार नाही, पण धर्मही कधी सोडणार नाहीस.स्वतः ची नातीगोती तू कशी जपतेस,कर्म कशी पार पाडतेस यावर तुझं पुढचं जीवन अवलंबून आहे.शेवटी एकच सांगतो, तुझ्यामुळे सर्वांना सौख्य आनंद मिळून तुझ्या प्रेमाचा विजय होईल.हे बोलतांना त्यांच्या डोळ्यात दुःखद छटा चमकून गेली.त्यांना आपल्या गमावलेल्या प्रेमाची आठवण झाली असेल कां? विश्वामित्रांचा निरोप घेऊन चौघीही आपल्या प्रासादाकडे निघाल्या.त्या प्रासादाजवळ पोहोचल्या तेवढ्यात त्यांच्या कानावर लक्ष्मणाचे रागीट शब्द कानावर पडले.मला विवाह करायचा नाही हे वारंवार सांगूनही कां माझ्यावर लादल्या जात आहे?राम समजावत म्हणाले,कां असा हेकटपणा करतोस?तूं विवाह केला नाही तर आपली किती लाजिरवाणी अवस्था होईल?उर्मिलेला कळलं हे बोलणं आपल्याच संबधीच आहे,ती जागीच थबकून पुढे ऐकू लागली मी विवाह न करणेच योग्य आहे,त्यामुळे इतरांची ह्रदय तरी भंग होणार नाही.मग असे उर्मिलेला जाऊन सांग,कदाचित ती तुला समजावून घेऊ शकेल राम म्हणाले.

मी तिला कसं सांगू?उर्मिलाला हे सारं असह्य झालं,पुढचं ऐकण्याआधीच ती तीथून निघाली,तर पावलांचा आवाज आल्याने लक्ष्मणाने गवाक्षातून पाहिले. त्याच्या चेहर्‍यावर औदासिन्य,अविश्वास पसरला.गवाक्षातून लक्ष्मणाने तिला साद घातली.थांब मिला,थांब…पण ती न थांबता तडक,लहानपणापासून जेव्हा तिला शांती एकांताची गरज असे,त्या वेळी या दाट झाडीत येऊन बसत असे. ती अतिशय अस्वस्थ होती.डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते.ह्रदय भंग झालेलं,मनांतील वेदना कांही केल्या कमी होत नव्हत्या.म्हणजे त्यांचं प्रेम नव्हतं तर?तिच्याशी त्यांना विवाह करायचा नव्हता तर?हा नकार पचवणं तिला जड जात होता.त्यांनी दाखवलेल्या परकेपणाने,वागण्याने तिचं मन,आत्मा, अस्तित्व अंतर्बाह्य ढवळलं होतं.ती मन मानेल तशी झाडीत पळत होती.हुंदक्यां नी शरीर थरथरु लागलं.तिचं हरवलेलं प्रेम,छिन्नविछिन्न झालेला विश्वास,वेदना की अपमान,नेमकं कशाचं दुःख जास्त हेच तिला समजेना.त्यांच्या प्रेमात पडण्याचा मुर्खपणा घडला का?त्यांना आयुष्यभर जपावं,सोबत करावी असं कां वाटत होतं?ते मिळणार नाही हे सत्य पचवणं कठीण जात होत.त्याहून त्यांना ती नकोशी ही भावनाच तिला मुळापासून उध्वस्त करीत होती.सूर्य माथ्यावर आला तेही तिला कळलच नाही.आपण न दिसल्याने प्रासादात गोंधळ उडेल,त्या आधी आपण जायला हव हे कळत होत. पण लक्ष्मण आपल्याशी विवाहास तयार नाही हे कसं सांगावे? तेवढ्यात झाडीत खसखस झाली.कुणी प्राणी असेल तर रक्षणार्थ आपल्याजवळ शस्र नाही हे लक्षात आल्यावर,एखादी झाडाची फांंदी किंवा दगड शोधावा म्हणून इकडे तिकडे पाहत असतांनाच अचानक लक्ष्मणच समोर अवतीर्ण झाले.तिला मिठीत घेण्याची अनिवार इच्छा महत् प्रयासाने दाबली. कांही वेळापूर्वी रामाशी बोलण्याची आठवण झाली.खरं तर ते शब्द तिच्या साठी नव्हतेच.पण दुर्देवाने तिने ऐकले. रामाशी बोलण्याआधी तिच्याशी संवाद साधायला हवा होता.त्यांना तिथे बघून , तुम्हाला ही वाट कशी गवसली?तुला शोधण्यासाठी आकाशपाताळ एक करुं शकतो मिला! मि..ला या शब्दातील ओलावा तिला सहन झाला नाही.

आवेगाने म्हणाली,अशी हाक परत नका मारु..कंठ दाटून आल्यामुळे तिला धड बोलताही येईना.मिला तुला दुखवण्याचा हेतू बिलकुल नव्हता.तू जे ऐकलेस त्यामागे फार मोठं वास्तव आहे. तुला सत्य सांगायचय पण.. पण काय? सांगण्याचं तेवढ धाडस नव्हतं ना? स्पष्टीकरण नकोय…उद्वेगाने लक्ष्मण म्हणाले,धाडस नाही अस नाही तर ह्रदय गमावलं जे तुला देऊ केलं …आणि त्या मुळेच पुढचं सारं कठीण झालं,माझं तुझ्यावर आत्यंतिक प्रेम आहे.मनापासून तूं मला हवी आहेस.तरी सुध्दा तुलां प्राप्त करुं शकत नाही. कडवटपणे उर्मिला म्हणाली,पुरे करा…मी स्वतः बोलणे ऐकले आहे.मिला तूं ऐकलस ते अर्धवट.मी तुला सांगीतल्या वर तुला गमवण्याची भिती वाटत होती.तूं माझ्या प्रेमाचा स्विकार करशील की नाही याची खात्री नव्हती.अगदी पहिल्यांदा तुला उपवनात बघितले,तेव्हाच माझं जीवन आमुलाग्र बदललं.माझी मनःशांती तत्व,वचनं…पूर्वीचं कांहीच उरलं नाही. माझं मन,ह्रदय,स्वाभिमान सारं सारं तूं हिरावून घेतलस.तुला आनंदी ठेवण्याचं कुठलही वचन देऊं शकत नसल्यामुळेच तुझ्याशी विवाह करुं शकत नाही हेच रामाला सांगत होतो.मिला..तुझ्यावर माझं अफाट प्रेम आहे.तरी सुध्दा विवाह करुं शकत नाही.मिला!मी उध्वस्त आहे गं लक्ष्मण पुढे बोलतच राहिले.. आजन्म अविवाहित राहण्याचं ठरवलं आहे.अष्टौप्रहर रामाबरोबर राहणे हेच माझं जीवन आहे.राम माझे सर्वस्व आहे. सखा,गुरु,जीवन,आत्मा,त्याच्याशिवाय माझं अस्तित्वच नाही.मी त्याचीच सावली आहे.आजपर्यंत याच पध्दतीने वाढलो आणि घडलोही.. माझी आई सुमित्रा इतर राण्यां प्रमाणे राजघराण्याची वंशज नसून तीचं घराणं दासीचं आहे अशी आवई उठवली म्हणून मी रामाची सेवा करतो असे सर्व म्हणतात,पण मला या प्रवादाशी कांही घेणं देणं नाही.माझ्या मातेइतकी दुसरी हुशार स्री दुसरी क्वचितच असेल.राम माझा ईश्वर आहे.त्याची सेवा आणि संरक्षण करणे हेच माझं कर्तव्य आहे हे बाळकडू तीने मला माझ्या जन्मापासून पाजले. मी रामाचा दास आहे.मोठ्या बंधूप्रति स्वतःला संपूर्ण समर्पित केलेला धाकटा भाऊ असच मी स्वतःला समजतो.आज वर हेच माझ्या आयुष्याचे ध्येय होत आणि अचानक तूं माझ्या आयुष्यात आलीस.त्यांच्या डोळ्यातील आर्जव बघून ती विरघळू लागली.कोणत्याही स्री कडे मी आकर्षित होणार नाही असाच ठाम समज असल्यामुळे आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय होता. कधी प्रेमात पडेल असे वाटलेच नाही.नुसता पडलोच नाही तर आकंठ बुडलो एखादी स्री इतकी सर्वगुणसंपन्न असू शकते असं वाटलंच नव्हतं.माझ्या तत्वाप्रमाणेच,तुझ्या बहिणी तुझा जीवनाधार आहे हे लक्षात आल्यावर मी जास्तच आकृष्ट झालो.खर सांगायच तर मी प्रेमप्रवाहात गंटागंळ्या खाऊ लागलो. नेमकी त्याचवेळी मनात विचित्र भीती निर्माण झाली.प्रेमाच्या या अनिवार ओढी मुळे कर्तव्यच्युत झालो तर?रामाच्या सेवेत चित्त विचलित झाले तर?खरं तर तू प्रत्येकवेळी वेगवेगळी विलोभनीय वाटत होती आणि मी वेडावत होतो.मला तूं संपूर्ण हवी होतीस,त्याचवेळी माझ्या तत्वांची आठवण येऊन मी तुला पूर्णपणे समर्पित होऊ शकणार नाही असे वाटत होते.रावणाने तुझ्याकडे पाहण्याचं धारिष्ट्य केलं तेव्हा माझा संताप अनावर झाला होता.इतर राजपुत्रांनी अपमानास्पद गोंधळ घातला होता तेव्हा इर्षा,असूये ने पेटून उठलो.तुला गमावण्याची भीती वाटत होती.त्याचवेळी लक्षात आले की, मी तुझ्या प्रेमात पडलो.परंतु कृतीत आणू शकत नाही हेही लक्षात आले होते. आणि याच नैराश्यामुळे स्वतःला तुझ्या पासून दूर ठेवू लागलो.तूं माझी कधीच होऊ शकणार नाही हे माहीत असल्यामुळेच चुकतय तुमचं!मी तुमचीच आहे, पण तुम्ही मात्र माझे नाहीत.आहे ग!आहे एवढं उत्कट,आंधळेपणे,अविचाराने कधीही कुणावर प्रेम केले नाही.माझ्या तील “तो” मला सतत वास्तव्याची जाणीव करुन देतो.मी सर्वस्वाने तुझा होऊ शकेल कां?आयुष्यात तुला सुख देऊ शकेल कां?या विचारांतच मी बंदिस्त झालोय ग… उर्मिलाच्या मनांतील राग,दुखावले ल्या भावना सर्व नाहीशा झाल्यात आणि हळुवार स्वरात म्हणाली,प्रेम म्हणजे देणं आणि तुम्ही स्वतःला मला द्यायला तयार नाही.मला तुमचं संपूर्ण समर्पन नकोय, मी तुमच्यावर प्रेम करीत असले तरी, तुमच्या निष्ठा,श्रध्दा माझेमुळे विसराव्या, कर्तव्यापासून विन्मुख व्हावे असे मला कधीच वाटणार नाही.तुमच्या भावांच्या, कुटुंबाच्याबद्दल असलेल्या निष्ठेच्या आड मी कधीही येणार नाही.त्याचप्रमाणे माझे कुटुंब,बहिणींपासून दुरावणार नाही हे ही तेवढेच ठामपणे सांगते.माझं जसं त्यांचे वरचं प्रेम कमी होणार नाही,तसच तुमचं ही होऊ नये.पण कधी तरी संघर्ष होऊ शकेल म्हणून कां प्रेम त्यागावं?अशा त्यागाला काय अर्थ? कदाचित माझ्या आयुष्यात द्विधा अवस्था निर्माण झालीच तर,मी रामाचीच निवड करेन..याच विषयावर तुझ्याशी सविस्तर बोलायचे होते,पण त्यापूर्वीच… जर आपला विवाह झालाच तर तुझ्या कडे संपूर्ण लक्ष देणे,तुला आनंदी,सुखी ठेवणे माझे कर्तव्य असेल पण तसं करुं शकणार नाही.तुझ्यावर अन्याय होईल,तू दुखावल्या जाशील.निवडीची वेळ आली तर तुझ्याऐवजी मी भावाची निवड करेन म्हणून मी विवाहास नाही म्हणतोय!लक्ष्मण कठोर पण सत्य सांगत होते. त्यांच्या स्पष्टोक्तीचं कौतुक करावं की, तिरस्कार हेच तिला समजत नव्हतं.स्वतः चे आयुष्य भावाला समर्पित केल्यामुळे ते तिला सामावून घेऊ शकत नव्हते. ज्यांच्यावर ती वेड्यासारखं प्रेम करीत होती.सत्य समजल्यावर विवाह करावा का?लक्ष्मण म्हणाले, हे सर्व तुला समजावून सांगायचे होते.पण मी लग्न करीन हे तातांनी गृहित धरुन आपणां सर्वांचे लग्न निश्चित केले.या परिस्थितीतू न कसं बाहेर पडावं,समजत नाही तुमचीद्वीधा मनःस्थिती समजते,पण जगाला, समाजाला पिताजींना कसे समजवणार?

लक्ष्मण म्हणाले,मी तुला कधीही अपमानित होऊ देणार नाही,तशी वेळ आलीच तर स्वतःला संपवेन.सत्य तातांना सांगेन..काय सांगणार? तुम्हा दोघां भावांमधे मी येऊं शकेन या भितीने तुम्ही विवाह करायला तयार नाही?निःश्वास टाकत लक्ष्मण म्हणाले,तुझ्यावर माझे कितीही प्रेम असले तरी मी विवाह करुं शकत नाही.माझ्या तत्वापायी तुझे जीवन,तुझा आनंद पायदळी नाही तुडवणार…. झालं तुमचं बोलून?आतां मी काय सांगते ते नीट ऐका!स्री आयुष्यात एकच वेळा प्रेम करते आणि माझ पहिलं आणि शेवटचं प्रेम तुम्ही आणि तुम्हीच आहात. निर्णय तुमच्या हाती आहे.लग्न मोडून माझ्या नशीबावर सोडून द्या,किंवा भावा प्रती असलेला समर्पित भाव कायम ठेवून माझ्याशी विवाह करणे.पती म्हणून तुमच्याशिवाय दुसर्‍याचा विचारही करुं शकत नाही.तुम्हाला मी स्विकारार्ह आहे?माझंही तुमच्यावर उत्कट प्रेम आहे स्वतःच्या तत्वापायी मला मात्र कायमचे गमावून बसाल.भविष्याचा विचार करुन वर्तमानापासून वंचित राहणे उचित नाही. मी तुम्हाला रामापासून कधीही हिरावून घेणार नाही हे तुम्हाला वचन देते.प्रासादात ऊर्मिलेने पाय ठेवल्या बरोबर तिन्ही बहिणींनी प्रश्नांचा भडीमार केला.मग उर्मिलेने कांहीही न लपवता हातचं कांहीही राखून न ठेवता.सारं सांगीतलं..आणि विवाहास कां तयार नाही हे सांगून म्हणाली,हा नियम फक्त मलाच नाही तर आपणां सर्वांना लागू आहे कारण त्या चौघा भावांत आपल्या सारखेच दृढबंध आहे.भविष्यात आपल्याला सारख्याच परिस्थितीला तोंड द्यावं लागेल हे जाणूनच विश्वामित्रांनी आपल्या चार बहिणींची निवड केली.त्या चार भावांमधील प्रेम असिम समर्पनाच्या पायावर उभं आहे.विशेषतः रामाप्रती त्या तिन्ही भावांचे बंधूभाव वाखाणण्यासारखं आहे.स्विकार करण्या वाचून त्यांचेपुढे पर्याय नव्हता. त्यांच्या विवाहाची तयारी सुरु असतां राजपुरोहित शतानंद जनकराजा समोर येऊन म्हणाले,इतरांच्या पत्रिका तर व्यवस्थित जुळल्या पण रामाच्या पत्रिके त मंगळ दोष असल्यामुळे,सीतेच्या आयुष्यात दुःखच येईल म्हणून हा विवाह रद्द करणे योग्य होईल.राजकुटुंबात एकच खळबळ उडाली.राजपुरोहितांच्या भविष्यकथनावर जनकांची नितांत श्रध्दा विश्वास होता.रामाने पण जिंकला होता. त्यामुळे जनकाची स्थिती मोठी विकट झाली होती.दुसर्‍या दिवशी सकाळी वरां कडील मंडळी मिथिलेला पोहचणार, तेव्हा राजा दशरथ व त्यांच्या पुत्रांना कसं सामोरं जायच? सुनयनाने ठामपणे मी माझ्या मुलीच्या भवितव्याशी खेळू इच्छित नाही असे म्हटल्यावर,सीतेने आपल्या मातापित्यांना ठासून सांगीतले, मी रामालाच पती मानले व जन्मोजन्मी हाच सहचर म्हणून स्विकारला आहे.त्या मुळे आतां कुठलाही वाद किंवा तडजोड नको.रामाशी जर विवाह होत नसेल तर आजन्म अविवाहित राहीन.

राजपुरोहितांच्या भाकितानुसार तू राजकन्या असूनही वैवाहिक जीवनाचा अधिकांश भाग अरण्यात घालवावा लागेल.माझं त्यांचेवर निःस्सीम प्रेम असल्यामुळे त्यांचेसोबत प्रत्येक परिस्थितीत सुखी राहीन.विवाह झाला नाही तर मात्र दुःख होईल.सीतेचा दृढ निश्चय पाहून सुनयनाला स्वतःची आठवण झाली.तिचेही असेच नव्हते कां झाले?कसंनुसं हसून म्हणाली,होऊ दे तुझ्या मनासारखं!सुखी भव!हाच आशिर्वाद उर्मिलेने स्वतःसाठी ग्राह्य धरला.कारण उर्मिलेने आपल्या कर्मठ, परंपरा,रीतीरुढीनुसार वागणार्‍या आईला तीने लक्ष्मणाबद्दल कांहीच सांगीतले नव्हते. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे राजा दशरथ धाकट्या दोन पुत्रांसह मिथीला नगरीत पोहोचले.नेहमीप्रमाणे देवदर्शनास निघालेल्या मांडवी व श्रुतीची घालमेल सुरु होती.आणखी एक दिवसा ने ज्या राजपुत्रांशी त्या विवाहबध्द होणार होत्या,त्यांना एकदा प्रत्यक्ष बघण्याची ओढ होती.आणि त्यांची प्रार्थना फळास आली.रोजची पुजा आटोपून त्या परत येत असतांना,उपवनात फिरणार्‍या राज पुत्रांवर त्यांची नजर पडली.राजकन्यांना आज हळद लावण्याचा विधि असल्याने, आपल्या वाग्दत्त वरांकडे जेमतेम नेत्र कटाक्ष फक्त टाकू शकल्या.उर्मिला लक्ष्मणाचा वेध घेत असतांना त्यांच्या समवेत तीन भावांसह एक सुंदर स्री होती ती हसून बोलत असलेली बघून उर्मिले च्या ह्रदयात असूयेची कळ उठली.कोण असेल ती स्री?त्या दोघांमधील सहज हसणे बोलणे उर्मिलेला सतावू लागले.इकडे राजमहालात राजा दशरथ, वसिष्ठमुनी,राजा जनक,विश्वामित्र आणि राजगुरु शतानंद यांनी चारही जोडप्यां साठी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुयोग्य मुहुर्त सुनिश्चित केला.

विवाहदिनी चारही वधू आपल्या आवडत्या रंगाच्या वधूवेषात तयार झाल्या.विवाहविधी अंतिम टप्प्यात आली होती.सनई चौघड्यांच्या जयघोषा त चारही वधूंनी आपापल्या वरांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या.विवाह सोहळा संपन्न होत असतांना शत्रृघ्न आपल्या मिस्कील स्वभावाने सर्वांना हसवित होता.उर्मिलेची नजर मात्र त्या सुंदर तरुणीवर खिळलेली होती.ती तरुणी राजा दशरथ व राणी कौसल्याची मोठी मुलगी रामाची थोरली बहिण शांता होय,हे समजल्यावर उर्मिला स्वतःलाच धिक्कारुं लागली.ती राजकन्या असली तरी तिचे जीवन सुखनैव गेले नव्हते.ती राजकन्या म्हणून जरी जन्माला आली असली तरी,राणी कौशल्येची मोठी बहिण वार्शिणी व तिचा पती अंगदेश नरेश लोपपाद या निपुत्रिक जोडप्याने तिला दत्तक घेतले होते.ती अर्भकावस्थे पासूनच आपल्या मातापित्यांपासून दूर अंगदेशची राजकुमारी म्हणून वाढूं लागली.तिने वेद,कला,कौशल्य,संगीता चा गाढा अभ्यास करुन पांडित्य प्राप्त केलं होत.अतिशय रुपवान शांताचा विवाह राजपुत्राशी न होता ऋष्यशृंग ऋषींशी झाला आणि राज्यावर कोसळले ल्या भीषण दुष्काळापासून सर्वांची सोडवणूक केली होती.शातांनंतर दशरथ राजाला मूल बाळ न झाल्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या यज्ञासाठी शांताचे पती ऋष्यशृंग ऋषींना पाचारण केले होते.या यज्ञाचा प्रसाद म्हणून दशरथांना राम,लक्ष्मण, भरत,शत्रृघ्न हे चार पुत्र प्राप्त झाले.या चारही राजकुमारांच्या विवाहास ऋष्यशृंग ऋषी हजर होते.ते विश्वामित्रां शी गहन चर्चेत गढले असतांना शांताला येतांना बघून,त्यांच्या चेहर्‍यावरची गंभीर भाव जाऊन मार्दव उमटले.त्या दोघांची प्रेमकथा चित्तवेधक होती.शांता भेटण्यापूर्वी ऋष्यशृंग ऋषी एकांतवासात जीवन कंठीत होते.त्यांचा जन्म झाल्यावर त्यांची माता म्हणजेच उर्वशीने त्यांचे पिता विभंदकांच्या सुपुर्द केले होते.त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने उर्वशीला पृथ्वीवर पाठवले होते. तिचे कार्य संपल्यावर ती निघून गेली. तिच्या अश्या विश्वासघातामुळे समस्त स्री जातीविषयी त्यांच्या मनांत तिरस्कार निर्माण झाला आणि हीच भावना त्यांनी आपल्या पुत्रामधे निर्माण केली.जन्मा नंतर ऋष्यशृंगांना कधीच स्री दर्शन झाले नव्हते.पित्याने त्यांना घनदाट अरण्यात एकांतात ध्यानधारणेची दीक्षा दिली होती रोमपाद राज्यात अवर्षण व दुष्काळाचं पडलेलं संकट,ज्याने कठोर ब्रम्हश्चर्य पालन केलं अश्याच व्यक्तीकडून यज्ञ केल्यास हे संकट दूर होऊ शकेल असं भाकित केल्यावर,ऋष्यशृंगाशिवाय दुसरं कुणीही नव्हतं.पण त्याघनदाट अरण्यातील दुर्दम्य अंतरभागात जाऊन कोण त्यांना पाचारण करेल?आणि महत्वाचे म्हणजे,जंगलाच्या सुरक्षित परिसरातून विभंदकांनी आपल्या पुत्राला बाहेर येऊ दिलं असतं का?

अश्या कठीण व अडचणीच्या प्रसंगी शांताने पुढाकार घेतला.राजवारांग ने ला सोबत घेऊन ती त्या दाट अरण्यात शिरली.विभंदक ऋषी कुटीपासून दूर गेल्याची संधी साधून तीने ऋष्यशृंगांची भेट घेतली.अनपेक्षितपणे दोन सुंदर स्रीया समोर बघून ते बावरले.बघताक्षणी च ते शांताच्या प्रेमात पडले.अग्निहोत्र पूजा करण्यासाठी त्यांना आपल्या राज्यात येण्याची गळ घातली.प्रेमाची गोडी पहिल्यांदाच अनुभवणार्‍या ऋषीने यायचे कबूल केले.आपल्या संतप्त पित्या पासून दूर, ते शांताबरोबर अंगदेशी आले तिथल्या रुक्ष भूमीवर आपल्या शक्तीचा वापर करुन पाऊस पाडला.त्यांच्या पौरोहित्याखाली यज्ञाला प्रारंभ झाला. आभाळांत ढगांची दाटी झाली आणि इकडे विदंभकांच्या मनात संतापाने पेट घेतला.पुत्राला परत आणण्यासाठी तावा तावाने अंगदेशी पोहोचले तेव्हा आपल्या पुत्राचा विवाह राजकन्येशी होत असलेचे दिसले.त्यांनी मनाला समजावून शांत केले.संतापलेल्या श्वशूरांनी आपल्या गोड वाणीने व मृदु स्वभावाने जिंकले.वृध्द विभंदकांनी आपल्या पुत्र,स्नुषेला सौख्य पूर्ण,फलदायी,आनंदी व दीर्घ वैवाहिक जीवन जगण्याचा आशिर्वाद दिला.

अशी ही वस्रालंकाराने सजलेली शांता रामाच्या मागे उभी होती.उर्मिलेने तिच्याकडे आदराने बघितले.तिने लक्ष्मणाला वरमाला घातल्यावर,शांता म्हणाली, गुरु परशुरामांच्या कोपापासून जसे सौमित्रला तू वाचवले होते,तसेच मी माझ्या संतप्त श्वशूरांचा राग कसा शांत केला होता ते आठवले.प्रिये तू सदैव अशीच आनंदात राहशील शांताने आशिर्वाद दिला.आपली बहिण शांताचा लक्ष्मणाने परिचय करुन दिल्यावर उर्मिलाने तिला अभिविदन केले.शांताने प्रेमाने तिची विचारपूस केली व इतर भावजयांकडे मोर्चा वळवला.ती जाताच लक्ष्मण म्हणाले,काल उपवनात माझ्या सोबत शांताला बघून तुला असूया कां वाटली? मिला हा अविवेक आहे.ही भावना असुरक्षिततेच्या भावनेतून उदय होते, तुला माझी खात्री आहे ना?यापुढे कधीच तुला अससुरक्षित वाटणार नाही.मी सदैव तुझाच आहे.तिला भरुन आले.विवाह दिनी तिला वचन देत होते.

अशा प्रकारे मिथिलेच्या चार राज कन्यांचा विवाह अयोध्येच्या चार राजपुत्रां शी संपन्न झाला.नगरीत सगळीकडे उत्साहाला नुसतं उधाण आलं होतं.राजा दशरथ अयोध्येला परततांना आपल्या चार पुत्रांसह चार लेकींना सोबत नेणार या विचारांत असतांनाच,राजा जनक, राणी सुनयना,वसिष्ठ,विश्वामित्र,शतानंद आणि ऋष्यशृंग गंभीर चेहर्‍याने समोर आले.राजन! कसा कोण जाणे,उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा विवाह मुहुर्त चुकला. मुळात काढतांनाच चुक झाली.आतां नियती तर बदलतां येत नाही,पण कांही तोडगा निघते कां म्हणून त्यांनी राजगुरु वसिष्ठांकडे बघितले.मानेने नकार देत म्हणाले, राम-सीतेचा विवाह ज्या नक्षत्रा वर अवलंबून होता ते नक्षत्र देवांना स्विकारार्ह नसावं असं वाटते.असं कां? गोंधळलेले,क्रोधाने दशरथ म्हणाले,माझ्या पुत्राचं आणि सुनेचं वैवाहिक जीवन सुखी होऊ नये असं कुणाला,विशेष म्हणजे देवांना कां वाटावं?या निरागस दोन तरुण जीवांनी कुणाचं काय बिघडवलं? राम-सीताचा विवाह उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर संपन्न झाला असतां तर त्यांचे जीवन निर्विघ्न पार पडले असते.म्हणूनच नारदांच्या सुचनेनुसार अप्सराच्या वेषात चंद्रदेवाने इथे येऊन नर्तन करुन आपलं लक्ष वेधून घेतलं. तेवढ्या वेळात वातावरणांत बदल झाला ग्रहांनी आपली जागा बदलून मुहूर्त चुकवला.आखलेली योजना सफल झाल्यामुळे देव आनंद साजरा करीत आहेत.पण कां?संतापून दशरथांनी विचारले.कारण ही दैवगती आहे.त्यांची नियती निश्चित आहे. ऋष्यशृंग ऋषी शांतपणे समजावत म्हणाले,राम सीता सुखी संपन्न वैवाहिक जीवन जगले असते तर पुढे घडणार्‍या घटना ठरलेल्या क्रमाने घडल्या नसत्या.येणार्‍या काळात नियतीने ठरवलेल्या घटना घडणारच आहे,टाळतां येणे शक्य नाही.आपण आतां सध्याचा क्षणांचा आनंद घेऊयात! चारही ऋषींची व मातापिता, श्वशूरांची गभीर मुद्रा बघून उर्मिलाच्या लक्षात आलं की,कांही तरी घटना घडली आहे.ती धास्तावली.चारही बहिणींच्या नशिबात नेमकं काय आहे?कोणत्यातरी भयानक परिस्थितीकडे त्या ढकलल्या जात होत्या कां?तेवढ्यात तिला आपल्या पतीचा आश्वासक,सुरक्षित दिलेल्या वचनाची याद येऊन आत्मविश्वास जागृत झाला.येणार्‍या संकटाचा सामना धीराने करायचा निश्चय केला. निरोप घ्यायला मातेकडे आली. तिचा चिंतित चेहरा बघून म्हणाली, काळजी नको करुस.येणार्‍या दिवसांचा सामना आम्ही धीटाईने करुं.होय बेटा, मला खात्री आहे,तूं कोणतीही परिस्थिती निभावून नेशील.नवीन जीवनात तुझी पावलोपावली परीक्षा पाहिल्या जाईल. पण तूं जशी आहेस तशीच रहा.मन,बुध्दी साबुत ठेव.महत्वाचं म्हणजे,सीता आणि तुझ्या चुलत बहिणींना सांभाळ.एकमेकीं वर असलेलं प्रेम,विश्वास कधीही भंग होऊ देऊ नकोस.ऊर्मिला तूं सर्वांत खंबीर आहेस.यापूर्वीही तूं अनेकदा बहिणींच्या मातेची भूमिका निभावलीस. अशा कर्तृत्ववान कन्येची मी आई आहे याचा अभिमान आहे.बाळा आतां मागे वळून पाहू नकोस.फक्त समोर पाहायचय जा..बेटा..जा…उर्मिलाचा गळा दाटून आला.मोठ्या कष्टाने स्वतःला सावरत मातेपासून दूर झाली.तिच्यासाठी बहिणी खोळंबल्या होत्या.इथून पुढे त्या तिच्या आयुष्यभराच्या सोबती होत्या.भविष्यात त्यांच्यापुढे काय वाढलं होतं?उर्मिलाने स्वतःला निग्रहपूर्वक आवरले.ती नाउमेद होणार नव्हती.भविष्यात येणार्‍या संकटांना चार ही बंधू सज्ज होते.स्वतःवर त्यांचा दृढ विश्वास होता.एरवी सतत घुसमसणारे लक्ष्मणही विचलित नव्हते झाले.तिच्या कडे पाहत किंचित मान डोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.मार्ग सोपा नव्हता.पण एकमेकांच्या साथीने ते पार करणार होते.अयोध्येच्या भव्य राजप्रासादा जवळ रथ आला.त्या वास्तुची भव्यता पाहून उर्मिला थक्क झाली.तीन दिवसां चा प्रवास,मातापित्यांचा विरह आणि या नवीन घरांत उपरेपणाची भावना,या भव्य दिव्यतेपुढे आपण कःपदार्थ आहोत या विचाराने ती अस्वस्थ झाली.प्रासादाच्या भव्यतेला साजेसंच त्यांच स्वागतही भव्यच झालं.मात्र उर्मिलाला त्यात औपचारिकताच जास्त वाटली.अल्पावधीतच तिन्ही राण्या आल्या.प्रत्येक राणी किती वेगळी होती. कैकयी पट्टराणी असल्यानं ती सर्वप्रथम आली.राजा दशरथ तिच्या आहारी गेल्या ची वदंता उर्मिलाच्या कानावर आली होती.ती सौंदर्याची अत्युत्तम नमूना होती. पण उजव्या हाताची करंगळी वाकडी असल्यामुळे तिच्या नाजूक रेखीव हाता च्या सौंदर्यात बाधा आली होती.शंभरा सुरावर राजा दशरथ चालून गेले,त्यावेळी कैकयी त्यांच्या रथाचं सारथ्य करीत होते युध्दात शंभरासुराचा बाण दशरथांचे चिलखतला छेद करत त्यांच्या छातीत घुसला.जखमेतून भळभळा रक्त वाहूं लागलं.दशरथांचे प्राण धोक्यात असलेले बघून धीर न सोडतां,कैकयीने रथचक्र दुरुस्त केलं.एकीकडे रथ युध्दभूमीपासून दूर नेत करंगळीने रथचक्र तोलून धरत सुरक्षित अंतरावर येताच राजावर उपचार करुन त्यांना पुन्हा युध्दभूमीवर आणले. त्या वाकड्या करंगळीचे वैश्यम्य वाटण्या ऐवजी ती अभिमानाने मिरवित असे. परंपरेनुसार राम,सीतेला औक्षण करतांना कैकयीने सीतेला कटाक्षाने टाळले.सीतेच्या मुखावरचे हसू लोपले. इतर बहिणीही आवाक् झाल्यात.रानीने सीतेला नाकारले होते.आता उर्मिलाची पाळी होती.तिला मात्र औक्षण करतांना कौतुक करत म्हणाली,तूं सर्वगुणसंपन्न, जनक राजाची कन्या जानकी आणि मिथिला नगरीची राजकन्या मैथिली शोभतेस.माते,मी दोन्हीही नाही.या नावा ने सीता ओळखल्या जाते.नंतर कैकयीने मांडवी,श्रुतीलाही तशाच निर्वाकार चेहर्‍याने औक्षण केले.उर्मिलेचा संताप उफाळला.फक्त आपल्या एकटीशीच कां एवढ्या प्रेमाने वागावं?बहिणींमधे फूट पाडण्याची तर खेळी तर राणी खेळली नलेल ना?की,स्वतःचं वर्चस्व सिध्द करण्यासाठी अशी वागली असेल?

हा सोहळा सुरु असतांना कैकयी च्या विक्षिप्त वागण्याबद्दल कुणीच कसं बोललं नाही?दशरथ राजा तर प्रेमाने बघत होते.राण्यांमधे कैकयी विशेष प्रिय आहे हे त्यांंच्या वागण्यावरुन उघड दिसत होते.धाकट्या राणीच्या वागण्याने दुखावल्या गेलेली मनं सावरायचा प्रयत्न कौशल्याने केले. अतिशय प्रेमाने तिने चारही सुनांचे स्वागत केले.सुमित्रेने सुध्दा चारही राज कन्यांना मिठीत घेतले.सुमित्रेच्या स्पर्शा तून उर्मिलेला आदर,माया आणि आपुलकी जाणवली.अयोध्या नगरीने चारही नववधूंचे जोरदार स्वागत केलं, पण उर्मिलेला उत्साह नाही वाटला. कैकयीच्या पक्षपाती वागण्याने दुखावले ल्या सीतेला पटकन भेटायचे होते.पण संधी मिळत नव्हती.लक्ष्मण जसं तिचं संरक्षण करणार होते,तसच रामही करणार होते.राम दुखावल्या गेले हे लक्ष्मणच्या लक्षात आले पण राम शांत होते.संध्याकाळ उशीरापर्यंत वेगवेगळ्या विधी सुरु होत्या.त्यानंतर दासीने चौघींना त्यांच्या त्यांच्या शयनकक्षात पोहचवले. उर्मिला कक्षात पोहोचल्यावर तिचे डोळे लक्ष्मणाचा वेध घेत होते.दिवसभरांतील घटना जरी जास्त सुखद नसल्या तरी, निदान ही पहिली रात्र तरी अप्रतिम ठरावी अशी तिची इच्छा होती.आणि आलाच तो क्षण.दोघेही एकमेकांच्या मिठीत समावले.प्रणयाचा आवेग..जणूं काळच थांबला.शांत,क्लांत झाल्यावर, एका कुशीवर वळून तिने पतीला विचारले,धाकट्या राणीचं सीतेशी काय वाकडं आहे?तीच्या दृष्टीने तुम्ही चौघी बहिणी आमच्या योग्य वधू नसाव्यात. तिचे प्रयत्न सुरु होते आपल्या मना सारख्या सुनांची निवड करायची.विशेष म्हणजे रामाकरीतां तिच्या कल्पना फार वेगळ्या होत्या.त्याला सर्वोत्तम मिळावं हा तिचा प्रयत्न!म्हणजे सीता सर्वोत्तम नाही?तसे नाही.तूं जशी मिथिलेची राजकन्या आहे तशी सीता नाही.अनाथ म्हणून सीतेवर तीचा रोष.. लक्ष्मण म्हणाले,तिचे सुनांना निवडण्याचे काम पूर्ण व्हायच्या आधीच तातांनी,तिला सहभागी न करतां अंतिम निर्णय घेऊन चारही पुत्रांचे लग्न ठरवले.नेमक्या याच गोष्टीने ती दुखवल्या जाऊन संताप आला असेल.तशी ती पारदर्शक आहे, आणि समोरच्यानेही असावं हा तिचा आग्रह म्हणून तिचा विरस झाला असेल. आतां आपली पहिली रात्र या विवादातच घालवायची कां? असे म्हणून तिला जवळ ओढले. दुसर्‍या दिवशीही कैकयीचा राग शांत झाला नाही.सीतेला रामाची पत्नी स्विकारायला तयार नव्हती.तिचा सातत्याने अपमान करुं लागली.तात्काळ दुसरी वधू शोधून रामाचा पुनर्विवाह करण्याचा हट्ट धरला आणि दशरथ राजाने मान्य केला… दशरथ राजानेही रामाच्या पुनर्विवा हास सम्मती दिल्याचे कळल्यावर उर्मिला तडक सीतेच्या कक्षाकडे धाव घेतली. कक्षात सीता एकटीच निश्चल होती.राम विचारविनिमयासाठी दशरथांच्या कक्षेत गेले होते.आपल्या बहिणीचा उतरलेला चेहरा बघून उर्मिलाचा संताप अनावर झाला.तुझ्याशी असं वागण्याचं धाडस तरी कसं झालं?सीते तू गप्प बसायचं नाही.कालचे टोमणे,आणि आतां रामांचा पुनर्विवाह?सीते मी हे सहन करणार नाही..मीही नाही करणार!सीता ठामपणे म्हणाली.मी रामावर प्रेम केलय,ते मला सोडून दुसरीचे होऊच शकत नाही.आणि कुटुंब परंपरेला अनुसरुन बळी पडले तर माझ्या बाबतीत तसे घडणार नाही आणि मी तसं कधीच घडू देणार नाही.तिच्या शब्दात धार होती.त्यांची वाटेल ती आज्ञा ऐकायला आपण कणाहीन नाही.स्वतः चा अभिमान जपत धैर्याने वागण्याची दीक्षा आपल्याला मिळाली आहे.

तेवढ्यात राम लक्ष्मणांनी प्रवेश केल्यावर त्यांच्या सारं लक्षात आलं.रामां च्या मंद स्मिताने सार्‍या शंका निमाल्या. त्यांना एकांत मिळावा म्हणून जात असलेल्या उर्मिलाला थांबवत राम म्हणाले,मी सीतेच्या कोणत्याही गोष्टी साठी आतांच नाही तर भविष्यात देखील तिचा त्याग करणार नाही.एकापेक्षा अधिक पत्नी असणे पाप आहे हे कैकयी मातेनं आमच्या मनावर रुजवलय!सवत म्हणजे काय हे या तिन्हीही मातांनी सोसल.त्यांच्या मूक वेदनांचे आम्ही मूलं साक्षीदार आहोत.राजप्रतिष्ठेचा अवमान होऊ नये म्हणून त्या सोसत राहिल्या.प्रेम आदर,निष्ठा कशी राखावी हे माता कैकयीने आम्हाला शिकवले.उर्मिलेला पटलं नाही,असं असेल तर मग पुनर्विवाहचा मुद्दा उपस्थित झालाच कसा? सीताचा इतका तिरस्कार,दुस्वास, तुच्छता कां?

कारण साधं आहे.माझ्या मंगळ दोष व विवाह मुहुर्त चुकल्यामुळे माझेवर कांही विपरित संकट येऊन त्यात माझा शेवट होईल या शंकेने ती ग्रासली व सीतावर संताप काढून मनातील भावनां ना वाट मोकळी करुन दिली.सीतामुळेच सर्व समस्या निर्माण झाल्यात असा तिचा ग्रह झाला.तिच्या विषयी आकस नको धरुस.खरंतर या सर्वांसाठी मी जबाबदार आहे,मी केवळ सीताचीच नव्हे तर तुझी आणि इतर बहिणींची माफी मागतो.. नाही.. प्रिय पुत्रा!माझ्या वतीने तूं क्षमा मागायची आवश्यकता नाही. दरवाजातून आवाज आला.दारात देखणी पश्चातापदग्ध कैकयी उभी होती. तिच्या मुखावरचे पश्चातापाचे भाव बघून ऊर्मिलेला अतिशय आश्चर्य वाटले.कैकयी म्हणाली,अहंकार,संतापाच्या आहारी जाऊन अनेक चुकीचे गैरसमज करुन घेतले.रामाने जरी माझी बाजू स्पष्ट केली तरी तुम्हाला दुखवल्याबद्दल क्षमा करा, अस म्हणून सीतेसमोर येऊन दोन्ही हात जोडले.सीता प्रथम तर भांबावली,गोंधळ ली, पण लगेच सावरुन म्हणाली,आपलं मूल सुरक्षित,आनंदी,सर्व दुःखापासून दूर असावं असं कोणत्या मातेला वाटणार नाही?क्षमा मागण्याचा प्रश्नच नाही.मना तून सर्व काढून टाका. चकित होऊन उर्मिला बघत राहिली.कैकयीबद्दलचा आदर निर्माण झाला.कैकयीबद्दल गैरसमज केल्याबद्दल उर्मिला माफी मागणार हे अचूक ओळखून राम म्हणाले,नाही उर्मिला, माझ्या मातेच्या उद्देशाबद्दल प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आहे.तूं बहिणी चे संरक्षण करत होतीस आणि त्यासाठी तूं किती(ॲग्रेसिव्ह) कमाल मर्यादा गाठू शकतेस याची चुणुक तूं,लक्ष्मणाची कट्यार त्याचा वध करण्यासाठी उपसली होती हे मी नाही विसरलो.जिथे त्याला सोडले नाही तिथे मी कोण?रामाच्या डोळ्यातील मिस्किल भाव पाहून उर्मिला लज्जित झालेली बघून राणी पटकण म्हणाली,असंऽऽ! ही रक्तपिपासू तलवार बहाद्दर योध्दाही आहे तर?तणाव जाऊन तेथील वातावरण हास्याने भरुन गेले. उर्मिला कडे पाहत मार्दवाने कैकयी म्हणाली,आपल्या दोघींत बरचस साम्य आहे.राजकुमारी तुझ्या घरांत तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. कैकयीचं बोलणं स्तुती समजायची की,पश्चाताप?या प्रश्नाचं उत्तर तिला १४ वर्षांनी मिळणार होतं. विवाहाला दोन मास उलटले.एक दिवस चौघी बहिणी प्रासादासमोरील उद्यानात बसून गप्पा गोष्टी करीत, आपापल्या पतींच्या स्वभावाचे वर्णन करीत होत्या.मांडवी म्हणाली,रामांच्या मागे जसे लक्ष्मण सावली सारखे असतात,तसंच भरतामागे शत्रृघ्न असतो हे ऐकून कठोरपणे सीता म्हणाली,तूं सारखी राम आणि भरता तुणतुणं कां वाजवतेस? उर्मिला म्हणाली,मंथरा जे बाळकडू पाजते तेच ती उगाळते. मांडवी म्हणाली,मला सारं समजते. मी लहान नाही आता.संतापून सीता म्हणाली,मंथरा तुला जे रोज विषाची मात्रा देते,ते तुला आज जरी गोड वाटत असले तरी ते सत्य नाही.आपल्या बहिणींचा आवेश बघून उर्मिलेला धक्का बसला.नेहमीच्या भगिनीप्रेमाचा अंशही नव्हता.त्याऐवजी जाणवत होते गुढ वैर!इतक्या साध्या गप्पांनी घेतलेले गंभीर वळणाने उर्मिला बेचैन झाली.मांडवी म्हणाली,राम आणि भरतात नक्कीच स्पर्धा आहे.वेळच आली तर, लक्ष्मण रामांची निवड करतील,शत्रृघ्न मात्र भरतामागूनच जातील.उर्मिलेने चक्रावून विचारले,पण ते भाऊ वेगळे कां होतील?मांडवी तूं कोणत्या स्पर्धेबद्दल बोलतेस?मुद्दाम चीड येण्यासारख मांडवी वर्तन करीत होती.मुख्य म्हणजे ती अप्रत्यक्षपणे कांहीतरी सुचवत होती.हे असच राहिलं तर चार बहिणींमधे वितुष्ट यायला वेळ लागणार नाही.मांडवी घुमसत म्हणाली,पुढील सप्ताहात चार भावांमधे होणार्‍या धनुर्विद्या स्पर्धेबद्दल बोलत नाही मी!राम आणि भरतामधे जे जन्मजात वैर आहे त्याबद्दल कोणी उघड बोलत नाही,मान्य करत नाही,त्याबद्दल बोलत आहे.अरेऽ मुळात राम व भरताचं वैर असण्याचं कारणच काय?उत्सुकतेने सीताने विचारले? जेष्ठ राणी कौसल्याचा पुत्र राम आणि लाडकी राणी कैकयीचा पुत्र भरत हे दोघेही सिंहासनाला पात्र आहेत.मांडवी म्हणाली.

कौसल्याच्या पोटी शांताचा जन्म झाल्यावर कितीतरी वर्षे राजा दशरथ अपत्यहीन होते.एकदा शिकारीला गेले असतां तिथे त्यांच्या दृष्टीस देखणी आकर्षक कैकयी पडली.पाहतांक्षणी तिच्या प्रेमात पडले.तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र अयोध्येचा राजा व्हावा या अटीवर तिच्याशी दशरथांनी विवाह केला तिलाही अपत्य न झाल्याने वसिष्ठांच्या सल्ल्यानुसार ऋष्यशृंग ऋषींच्या मार्गदर्श ना खाली अश्वभेध व पुत्रकामेष्टी यज्ञ केला.यज्ञातून पायस घेऊन अग्निदेव आले.तिनही राण्यांना पायसचा प्रसाद दिला.नंतर दशरथांना चार पुत्रांची प्राप्ती झाली.ही कथा मांडवीने सांगीतल्यावर सीता ठामपणे म्हणाली,हे भाऊ कधीही एकमेकांशी युध्द करणार नाही. मांडवी म्हणाली,दशरथ-कैकयी विवाहाच्या वेळीच्या अटीनुसार भरतच राजा होईल.आणि उर्मिला..तसेही मंथरे च्या म्हणण्यानुसार तुझी सासु सुमित्रा मगध राजकन्या नसून ती कोणाचा वारसा चालवते हे संदिग्ध आहे.दिलेला शब्द पाळणे रघुवंशाचे ब्रिद असल्यामुळे भरतच राजसिंंहासनावर बसेल.म्हणजे तूं राणी होशील, हो ना?याच मुद्यावरुन मंथराने तुला तिच्या बाजूने वळवून घेतले ना?मंथराने मांडवीला चांगलेच कह्यात घेतले होते,ती कांहीच ऐकायच्या मनःस्थितीत नव्हती.श्रुती संतापून आवेशाने कांही बोलणार तोच,उर्मिला म्हणाली,कृपा करा थांबवा हे सारंऽऽ आपण चक्क भांडतो आहोत.या आधीही आपली भांडणं झालीत पण त्यात अशी गलिच्छ सूड भावना कधीच नव्हती.कोण राजा होणार कोण राणी? यामुळे काय फरक पडणार आहे?चुलत बहिणी,युवराज्ञी,राणी या आयामांनी आपल्या नात्यात आजवर कधी स्पर्श झाला का?मग आजच अस कां?अगऽऽ मंथरा आपल्यात असलेल्या एकीमधे फुट पाडत आहे.उर्मिला सौम्य शब्दात समजावत होती.अग!मंथरा जाणीवपूर्वक अविश्वास व दुष्टबुध्दी आपल्यात निर्माण करत आहे.मला हीच भीती होती म्हणूनच तुला खोदून खोदून विचारत तुला बोलके करीत होते,प्रश्न विचारीत होते.मंथरेचं विष किती जहाल परिणामकारक आहे हे तुमच्या लक्षात एव्हाना आलंच असेल. मांडवीला पश्चाताप झाला.अगदी काकुळतेने ती सीतेची क्षमायाचना करुं लागली.सीता म्हणाली,तूं मंथरेसारख्या शुल्लक दासीवर विश्वास ठेवलास याचेच जास्त वाईट वाटते.मांडवीऽ मी तातांना सांपडलेली मुलगी म्हणून तूं मला नेहमी परकं समजलीस,कां ग?म्हणजे? सीताऽ तुझ्या सुध्दा मनात मंथरेने विष पेरुन दोघींनाही एकमेकींविरुध्द भडकवले तर

मांडवी या चौंघीमधे सर्वाधिक महत्वा कांक्षी,तीक्ष्ण बुध्दी,राजकीय धूर्त होती. तरी सुध्दा ती भौतिक प्रतिष्ठेच्या इतकी आहारी जाईल असे उर्मिलेला स्वप्नातही वाटले नव्हते.मांडवी पश्चातापदग्ध झाल्यावर सीता म्हणाली,मी सुध्दा तुझ्या सारखीच फसले गऽऽ!बराच वेळ कुणीच बोलल्या नाही.मंथरच्या दुष्ट बुध्दीमुळे त्या हादरल्या होत्या.पण त्यांचे अंतर्मन या निमित्याने उघड झाले होते.आतां मंथरेच्या मायाजाळ्यात कोण अडकणार?हा विचार उर्मिलेच्या मनात आला.तिला फार वेळ वाट बघावी लागली नाही.चारच दिवसांनी शस्रविद्या स्पर्धा होती.ही सुवर्णसंधी होती मंथरेसाठी..स्पर्धेचा दिवस उजाडला.दशरथां च्या बाजूने बसलेल्या तीनही राण्या चारही राजपुत्रांकडे अभिमानाने बघत होत्या.रामच विजयी होईल याबद्दल कोणालाच शंका नव्हती.राजाच्या मुखा वर आनंद मावत नव्हता.चौघी बहिणी एकत्रित बसल्या होत्या,पण थोड्या वेळाने मांडवी सासर्‍याजवळ जाऊन बसली.त्या भयंकर दिवसांपासून मांडवी आपल्या बहिणींशी चकार शब्दही बोलली नव्हती.त्यांच्यातील अबोबा वाढतच होता,त्यामुळेच उर्मिला चिंतित होती.स्पर्धेत उतरायची भरताची बिलकुल इच्छा नव्हती,पण रामाच्या आग्रहाने तयार झाला.चौघांनीही वरवर भाग घेतला.स्पर्धा सुरु झाली व संपलीही भरताने सर्व कौशल्यात अग्रक्रम प्राप्त केले असूनही,रामास विजेता म्हणून घोषित केल्याचे बघून सर्व उपस्थित आश्चर्यचकित झालेत.मग वसिष्ठ म्हणाले या प्रत्यक्ष स्पर्धेव्यतिरिक्त राजपुत्रांची वेगळ्या प्रकारे परीक्षा घेतली होती. वसिष्ठांच्या एका शिष्याने त्यांच्याच सांगण्यावरुन वेषांतर करुन,ऐन स्पर्धा सुरु असतांना याचकाच्या रुपात मदत मागीतली होती,रामाने स्पर्धा सोडून त्याच्या मदतीस धावले.रामाच्या या कृतीने ते दुसर्‍या स्पर्धेत विजेता ठरले आणि सिंहासनाचा वारस…उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. मंथरेचा चेहरा मात्र नैराश्यग्रस्त झाला

रात्री एकांतात लक्ष्मणाला उर्मिला म्हणाली,कसे खेळलात तुम्ही? नेमके कोणाला मुर्ख बनवत होता? हसून लक्ष्मण म्हणाले,आमच्या पालकांना! हे शक्ती प्रदर्शन करण्यास आमचा,विशेषतः भरताचा ठाम विरोध होता,परंतु मंथरेच्या सांगण्यावरुन कैकयी मातेन पिताश्रींना तयार केले.आमच्या चौघांपैकी सर्वोत्तम कोण हे अयोध्यावासियांना समजावं अशी तिची इच्छा होती.मंथरेने आयोजन उत्तम केले होते पण तिचा डाव फसला. दुसर्‍या दिवशी कुबडी मंथरा आपल्या निजी कक्षात बसलेली पाहून उर्मिला चकित झाली.हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी?सीताने बनवलेला गरम गरम पदार्थ तुला खायला आणला. घे खाऊन उन उन.आणि सीतेबद्दल विपरित सांगून उर्मिलेच्या मनात विष पेरणी करुं लागली.तिचे सारे मुद्दे पटण्या सारखे होते व पटलेही,पण क्षणभरच! एकदम तिला मांडवीच्या वागण्याची याद आली आणि स्वतःला सावरले.मंथरेचा कावेबाजपणा उर्मिलेच्या लक्षात आला. आणि संताप जागा झाला.पण सौम्य शब्दात मंथरेला तोडून टाकत म्हणाली, मंथरा,पुरे आतां,धन्यवाद,निघ आता… अपमानाने मंथरा किंचाळली,मी राणीची मुख्य दासी व दूधमाता आहे.माझ्याशी तूं आदराने वागायला हवय!आणि त्याच आवेशात सीतेची व तिची तुलना करत पुनः विष पेरले.मंथरेने तिच्या दुखर्‍या नसेलाच स्पर्श केला आणि लहानपणा पासूनचे अनेक प्रसंग तिच्या नजरेसमोर तरळले.पण शेवटी विवेकाने मात केली. उर्मिला अतिशय थंड स्वरात म्हणाली,तूं कोण आहेस हे सांगीतले.आतां मी कोण याची तुला आठवण करुन देते.मी राज कन्या असून,ज्यांची सर्वांना सर्वाधिक भिती वाटते त्या लक्ष्मणाची पत्नी आहे. यापुढे माझ्या अनुमतीशिवाय इथे पाऊल टाकण्याचं धाडस करुं नकोस.तेव्हा ताबडतोब निघायचे… क्रोधीत मंथरा पाय आपटत निघून बाहेर पडली.तेवढ्यात लक्ष्मणाचा संतप्त स्वर कानी पडला.तूं इथे काय करतेस? मंथरा,तुला याआधीही सांगीतले होते, आज पुन्हा सांगतो,माझ्या कक्षाच्या किंवा पत्नीच्या आसपासही फिरकायचे नाही.प्रवेशत लक्ष्मणांनी कठोर स्वरांत विचारले,ही आगलावी कपटी स्री कशाला आली होती.

ऊर्मिलेने लक्ष्मणाला सांगीतले, अत्यंत अल्पावधीत सीता व मांडवीच्या मनात विष पेरण्यात मंथरेने यश मिळवले मिळवणारच!कारण तुम्ही बहिणी नवीन आहांत.इथले कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही,उलट सारे तिचा तिरस्कारच करतात.माता कैकयीमुळे सगळे तिला सहन करतात.

राजप्रासादाभोवती पसरलेल्या विसृत उपवनात उर्मिला निसर्गचित्र रंगवीत होती,सोबत विचारचक्रही सुरु होते.राजा दशरथ वयोवृध्द झाले होते. त्यांना चिंता होती,युवराज्याभिषेकाची. या राजप्रासादात सर्वात दुःखी होती माता कौसल्या.कौसल्याचे जग जरी रामा भोवती फिरत असलं तरी, पारदर्शक, स्पष्टवक्ती कैकयी चारही पुत्रांवर सारखी माया करीत होती.भरतापेक्षाही अधिक ममत्व रामावर होत.शिघ्रकोपी लक्ष्मणा शी मात्र ती जपून वागत असे.पण त्यांचा रामाप्रती असलेल्या एकनिष्ठतेचा आदर

वाटे.रामावर जास्त प्रेम,राजा दशरथाचं जीवापाड प्रेम असल्यामुळे तर करत नसेल ना?अशी शंका उर्मिलेला आली.

अलिकडे मांडवी अंतर राखून वागत असल्यामुळे चौघींमधे पूर्वीसारखी सहजता नव्हती.शक्य तेवढ्या लवकर ही कटूता दूर होण्याच्या दृष्टीन उर्मिलाचे प्रयत्न सुरु होते,पण मांडवी दाद देत नव्हती.अभेद्य भिंतीप्रमाणे तिच्या जगात या तिघींना प्रवेश नव्हता.वास्तविक मांडवी व उर्मिला एकमेकींच्या खुप जवळ होत्या.तरी पण त्यांच्या नात्यातील सहज संबंध कां दुरावेत?विचारांच्या व रंगकामात गर्क उर्मिलेला केकय देशातून आलेला दूत दिसला नाही.मनाच्या अस्वस्थतेमुळे मनासारखे चित्र जमले नाही.कितीतरी वेळ तशीच सुन्नपणे बसली होती.तेवढ्यात लक्ष्मणाने येऊन कशाचा एवढा विचार करते म्हणून विचारले.म्हणजे तुलाही माहित झाले तर काय?माता कैकयीचे पिता अश्वपतींची प्रकृती गंभीर आहे,ते विवाहाला उपस्थित राहू शकले नव्हते,म्हणून भरत शत्रृघ्नसह नववधूंना भेटण्याची इच्छा व याचवेळी दुर्देवाने केकय देशावर शत्रूने आक्रमण केल्यामुळे भरताचे मामा युध्दजीतने भाचांकडून मदतीची मागणी केली.ते चौघेही रवाना होत आहेत.पण मला न भेटतां मांडवी व श्रुती कशा जातील? तेवढा अवधी नव्हता.सर्व अचानकच ठरलं.एव्हाना ते रवानाही झाले असतील..ऐकले मात्र नी धावतच त्यांना भेटायला निघाली,मधेच भेटलेल्या सुमंत्रांना विचारल्यावर,नुकतेच सर्वाधिक चपळ अश्वावर आरुढ होऊन रवाना झाले.त्यांच्या मागोमाग दोन्ही राजकुमारी रथातून रवाना झाल्यात.नमस्कार करुन सुमंत्र निघून गेले. उर्मिला विषन्न झाली.जाण्याआधी चुलत बहिणींशी बोलणे आवश्यक होते. परत कधी संधी मिळेल माहित नव्हते. ती तशीच पाय ओढत कक्षात आल्यावर लक्ष्मणांनी विचारले,मिला काय झाले?आणि इतक्या दिवसांचा बांधून असलेला उद्रेक एकदम प्रगटला. त्यांच्या छातीवर डोके ठेवून,छाती भिजवू लागली.नको काळजी करुस,त्या लवकर परत येतील.तसं नाही…आणि कांही दिवसांपूर्वी चौघींमधे झालेली बोलाचाली वाद,मतभेद,दुरावल्या गेलली मने,आणि मांडवी कशी टाळते हे सर्व कथन केल्या वर लक्ष्मण म्हणाले,हे सर्व आधी कां नाही सांगीतले?बरं!बघतो मी!पण ताबडतोब संवाद साधून चुकीचे गैर समज दूर करायला हवेत. उर्मिलाने विचारले,तुम्हा भावांमधे कधी मतभेद होतात का? होतात ना.. पण,क्षणिक असतात.परस्पर सामंज्यस्य समजुतदारपणा,आकलन,विवेक आणि परानुभुतीवर आधारीत तर्कसंगतीमुळे आमच्या भावातील संबंध दृढ आहेत. आम्ही बंधू कधीही एकमेकांविरुध्द जाणार नाही…आणि नियती हसत होती पुढे घडणार्‍या घटनांसाठी… मांडवी आणि श्रुतकीर्तीला केकय नगरीला जाऊन केवळ सप्ताहच ऊलटला तरी त्यांची उणीव उर्मिलेला तीव्रतेने जाणवत होती.सीता अधिकांश वेळ पाकगृहात..उर्मिला एकटी पडली. तिला अभ्यास आणि चित्रकले शिवाय दुसरे काम नव्हते.ती अशी विचारांत मग्न असतांना लक्ष्मण येऊन म्हणाले,तातांनी नुकतीच राजसभेत रामाचा युवराजपदा चा उद्या अभिषेक होईलची घोषणा केली. कां? एवढ्या घाईने कां? आश्चर्याने तिने विचारले.तातांची तशी इच्छा आहे.पण भरत शत्रृघ्न इथे नाहीत,शिवाय अशा महत्वाच्या प्रसंगी राजा अश्वपती,माझे पिता जनक,शांताताई यांना निमंत्रण नको द्यायला?की,भरताच्या अनुपस्थिती चा लाभ घेण्याचा त्यांचा मानस आहे? मिला,कांहीही बोलू नकोस.जास्त वेळ नाही.सगळं अघटीत घडत आहे.या समारंभासाठी तूं सीतेला तयार कर हे सांगायला आलोय!राम सीता आज दिवसभर उपास करतील.उद्याच्या मुख्य विधीपूर्वी आज त्यांना अनेक उपविधी कराव्या लागतील.ठीक आहे.तुला काय वाटते मला आनंद नाही झाला?पण ज्या घाईने हे घडत आहे त्यामुळे नवल वाटत आहे व शाशंकही! मिला,तातांना अलिकडे जी दुःस्वप्ने पडत आहे त्यामुळे ते त्रस्त आहे आणि प्रकृतीही ढासळली आहे.त्यांना वाटते कोणत्याही क्षणी आपल्याला मृत्यु येईल.त्याआधी त्यांना रामाचा अभिषेक बघायची इच्छा आहे.हा कुठला व्यूह नाही तर एका वयस्कर त्रस्त पित्याची भीती आहे ही! माता कैकयीला हे माहीत आहे?अजून नाही.नुकतंच रामाने मला व माता कौसल्येला सांगीतले नेमके त्यावेळी तिथे माझी आई व सीता उपस्थित होती.घाई नाही का होत?कधी नव्हे ते आज मी तातांच्या निर्णयाशी सहमत आहे.कां? भरतावर तुमचा विश्वास नाही? आहे ना! पण तो त्या मातेचा पुत्र आहे,जीच्या मनात मंथरेनं वर्षानुवर्षे विष कालवत राहीली.तुझ्या लक्षात आले असेल,ती कधीच भरत म्हणून हाक न मारतां युवराज म्हणते.तो तरुण आहे.त्याच्या मनावर मातामह किंवा मातेचा प्रभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माता कैकयीचा हट्टी स्वभावाची तुला कल्पना नाही.तो तिच्या हट्टाला बळी पडू शकतो.पण त्यांना रामच राजा व्हायला हवा ना?खरय! पण मनातून वाटत कां हा ही प्रश्नच आहे.

खरं म्हणजे,माझ्या भावनांची सरमिसळ झाली.राम राजा होणार याचा आनंद आहे,पण नक्कीच कांहीतरी गोंधळ होईलसे वाटते.अल्पावधीतच विधी सुरु होईल,तेव्हा त्वरा करुन शक्य तेवढ्या लवकर सीतेला तयार कर,असे म्हणून लक्ष्मण निघून गेले.धास्तावल्या मनाने उर्मिला सीतेच्या कक्षाकडे निघाली कैकयीचा पुत्र राजगादीवर बसेल असं वचन अश्वपतींना दिले होते.त्या अनुषंगा ने राजांनी कैकयी मातेशी बोलायला हवे होते,वधू निवडतांनाही त्यांनी डावलले होते.

सीतेच्या कक्षात प्रवेश केल्यावर, सीता स्वस्थ बसलेली होती.उद्या रामाचा अभिषेक!पण तीच्या ठायी आनंद किंवा उत्साह दिसत नव्हता.राम आतांच कौसल्यामातेला भेटायला गेले.त्यांनी ही वार्ता आधी कैकयीमातेला सांगायला हवी होती.श्रुती,मांडवीची उणीव भासत आहे,त्या येईपर्यत थांबायला हवे होते. आतां वेळ नको दवडू,चल लवकर तयार हो! मी मांडवीच्या हक्कावर घाला तर घालत नाही ना?मला फार अपराध्या सारखे वाटत आहे.उर्मिला म्हणाली,अग! ते तिचे शब्द नव्हतेच.मंथरेनी तिच्या मनात भरवलेले विचार होते.कुठे आहे मंथरा? बहुतेक ती कैकयीमातेकडे असावी.

अजून पुरेसे उजाडलेही नव्हते तरी,लोकांची प्रासादाकडे रिघ लागली होती.संपूर्ण अयोध्या नगरी नववधूसार खी सजली होती.अभिषेकाची जय्यत तयारी झाली होती.कुठही ऊणं नव्हतं. ढोल,ताशे,तुतार्‍या,सनई,चौघड्याचा निनाद सुरु होता.सर्वीकडे हर्ष उत्साहाचे वातावरण होते.विविधरंगी फुलांनी राज प्रासाद सजला होता.पण अद्याप राजा दशरथ कक्षेबाहेर आले नव्हते.मुनी वसिष्ठ शिष्यांसह येऊन पोहोचले होते. मंत्रीगण,वरिष्ठ अधिकारी,सन्माननीय नागरिक राजसभेत उपस्थित होते. कौशल्याच्या चेहर्‍यावरील आनंद, अभिमान लपत नव्हता.सुमित्रा नेहमी सारखी गंभीर!पण तिसरी राणी अजून कां आली नव्हती.उर्मिलेच्या मनांत शंके चे पाल चुकचुकली.मंथराही कुठे दिसत नव्हती. राम-सीता राज्याभिषेकासाठी सज्ज होते.मुख्यमंत्री सुमंताला बोलावून वसिष्ठ म्हणाले,राज्यभिषेकाची सर्व तयारी झाली आहे.राजांना बोलवून आणा.थोड्याच वेळात उतरलेल्या चेहर्‍याने एकटेच आलेले सुमंताला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.रामाला बोलावले असल्याने ते राजाच्या कक्षेत गेले आहेत. लक्ष्मणही राजाच्या कक्षाकडे गेले.नेमकं काय घडलं याबद्दल तर्कवितर्क सुरु होते. सीतेने उर्मिलेचा हात धरला.भीतीमुळे पोटात खड्डा पडला.कौसल्या,सुमित्रा चिंतित झाल्या.राज्याभिषेकाला उशीर कां होत आहे म्हणून राजप्रासादाबाहेर प्रजाजन अस्वस्थ झाले.अर्ध्या घटकेनंतर अंगावर कोणतेही राजचिन्ह नसलेले राम शांत चेहर्‍याने राजसभेत आले.लक्ष्मण संतापाने घुसमसत होता.नक्कीच कांही तरी अनिष्ट घडलंय! उर्मिलेच्या मनात काहूर उठले…. वस्रालंकाराविरहित साध्या पोषाखात रामाने येऊन सांगीतले,हे सिंहासन भरता साठी असून,मला १४ वर्षे दंडकारण्यात वनवास घेण्याची आज्ञा पिताजींनी दिली आहे.माते हे तुझ्या कानावर घालण्या साठी इथे आलोय,दुःखावेगाने कौसल्या कोसळणार तोच रामलक्ष्मणाने तिला सावरले.ठरलेल्या कार्यक्रमात बदल झाल्यामुळे उपस्थितांना जाण्याची नम्र सुचना लक्ष्मणाने दिली.कळवळून कौसल्या म्हणाली,रामाऽ तूं मला सोडून कसा जाऊ शकतोस?अरेऽ आतांपर्यतच अंधकार आयुष्य तुझ्याच आशेवर जगत आले.एक दिवस राम राजा होईल,आपण राजमाता होऊं या आशेवर सारं सहन करत आले.तुझ्याशिवाय मी कशी राहू शकेन?माते!पित्याची आज्ञा पाळणे माझे कर्तव्य,धर्म आहे.लक्ष्मणाचा उद्रेक झाला १४ वर्षाचा वनवास?असा कोणता गुन्हा घडला ज्याची येवढी कठोर शिक्षा ठोठाव ण्यात आली?शंभासुराच्या युध्दात कैकयीने त्यांचे प्राण वाचवले होते म्हणून तिला दिलेल्या दोन “वरांची” पूर्ती आज करावी लागली.

प्रसंगाने अचानक घेतलेल्या कलाटणीने उर्मिला थिजली.मेंदु काम करेनासा झाला.लक्ष्मण कांहीकेल्या शांत होत नव्हते.ते रामाला म्हणाले,पित्याने पत्नीला दिलेले वचन पाळण्याचे बंधन तुझ्यावर नाही.अयोध्येचा आवडता युवराज,प्रजेचा शूर,दयाळू,न्याय राजपुत्र म्हणून आवडता आहेस.राजाविरुध्द उठाव करुं शकतोस.सेना,प्रजा तुझ्या पाठीशी उभे राहतील.तू फक्त हो म्हण, बाकीचे मी सांभाळतो.पण तू असं करणार नाहीस.अन्याय सहन करुन १४ वर्षे वनवास पत्करशील.कारण कुळाच्या परंपरेनुसार पुत्रधर्म, आज्ञाधारकपणा! आणि हे कैकयी मातेला व भरताला ठावूक होते.वाऽऽ काय सुंदर प्लॅन आखला…जिंकले ते…, लक्ष्मणाचा आवेश थोडा कमी झाल्यावर,राम म्हणाले,सत्ता,सिंहासना चा लोभ मला कधीच नव्हता.पित्याची आज्ञा ही एक संधी आहे माझ्यासाठी! मग तुझी माता,पत्नी,भावांचं काय?थरथरत्या आवाजांत कौसल्या म्हणाली. एक माता आपल्या पुत्राला घट्ट मिठीत धरुन रडणारं,भावनांना आव्हान देणारं ते दृष्य फार विदारक होतं.माते,तातांना दुसरा पर्यायच नव्हताअसहाय्य,शोकात बुडलेले तात कोसळले आहे,त्यांचं सांत्वन करणं माते या क्षणी तुझ्याच हाती आहे.माते तूं कैकयीमातेचा तिरस्कार करुं नकोस.तिला नियतीने करण्यास भाग पाडले.लक्ष्मण उसळून वाटेल तसे बोलूं लागल्यावर त्यांना शांतवत सुमित्रा म्हणाली,नियती बदलणार नाही,तेव्हा तूं आपल्या जेष्ठ बंधूच्या मागे खंबीरपणे उभा रहा.शांत होत लक्ष्मण रामाला क्षमा मागत म्हणाले मी तुझी सावली ना?तूं म्हटल्याप्रमाणे आपले देह दोन,प्राण एक आहे ना?मग मी तुझ्याबरोबर येणारच,नाही म्हणू नको हे ऐकताच उर्मिला स्तब्ध झाली.हे आपल्याला १४ वर्षे सोडून जाणार!आपण अनुमती देवो अथवा नाही,तरी जाणारच!राम म्हणाले,इथे राजप्रासादास तुझी जास्त गरज आहे,माता,सीता,उर्मि कडे लक्ष द्यायला.दंड मला एकट्याला मिळाला आहे.उसळून सीता म्हणाली, जिथे पती,तिथे पतीच्या प्रत्येक सुख दुःखात अर्धांगीनी या नात्याने मी असावे हा पत्नी म्हणून माझा धर्म आहे.तुमचा विरह मृत्युहुन कठीण आहे.तुम्ही जिथे जाणार तिथे मी असेन,नाही म्हणून माझा अपमान करुं नका. उर्मिला हादरली.सीता आणि अरण्य?उलट तिच्यामुळे दोघा भावांची जबाबदारी वाढेल.उर्मिला मधे बोलणार होती,पण आवरले.सीता,लक्ष्मणाने त्यांचे मानस स्पष्ट केले होते.ज्या दोन व्यक्तींवर उर्मिलाचे जीवापाड प्रेम होतं,त्यांनी तिला क्षणभरही गृहीत न धरतां आपला निर्णय ऐकवला होता.अनेक भावनांचा कल्लोळ तिच्या मनी दाटला.आपली इथे कोणाला ही आवश्यकता नाही,वियोगाच्या कल्पना तिला भयंकर वाटल्या.कोणाच्या ही लक्षात येणार नाही अश्या हलक्या पावलांनी तिथून निघून गेली.आपल्या प्रिय बहिणीने,पतीने नाकारल्याचे तिला भयंकर दुःख झाले.अवहेलना,प्रतारणा, विश्वासघात झाल्याची भावना मनी दाटली.ज्या पुरुषावर तिने अत्यांतिक प्रेम केले,त्याचा १४ वर्षे विरह कसा सहन कराव्?याचा अर्थ,त्यांच पुरेसे प्रेम नाही, त्यांना तिची गरज नाही तर?ह्रदय पिळवटलं,मन आक्रंदू लागलं. तेवढ्यात मिऽलाऽ असा पिळवट लेला लक्ष्मणाचा स्वर कानी पडला. तिच्या डोळ्यातील वेदनाचा डोह बघून ते चपापले.शक्य असल्यास मला क्षमा कर मिला माझं तुझ्यावर खरच खूप प्रेम आहे माझा तिरस्कार नको ग करुस!कसाबसा आवंढा गिळत लक्ष्मण म्हणाले,माझं मन अस्तित्व,आत्म्याला तूं व्यापलं आहेस.तूं माझ्यात सामावली आहेस.पुढची १४ वर्षे,तू अंतरंगात सामावलेली,तुझीच सोबत असेल. मग मला सोबत कां नाही नेत? अगऽ मी जात आहो ते रामाचा अंगरक्षक सैनिक म्हणून…आणि सैनिक युध्दभूमी वर पत्नीला नेत नसतो.वनवास सोपा नाही.राम सीताला बरोबर नेत आहे कारण तिचे रक्षण करण्यास तो समर्थ आहे.मी त्याचा रक्षक म्हणून जात आहे. पती म्हणून तुझे संरक्षण करुं शकेन कां ही शंका आहे.अयोध्याच्या भावी राजा, राणीचे रक्षण करणे हेच माझं एकमेव ध्येय आहे.अयोध्येच्या भवितव्याचं संरक्षण हे माझं कर्तव्य आहे,माझा जन्म त्यासाठी…शिवाय दंडकारण्यात असूरां चा निवास आहे.तिथल्या ऋषीमुनींचा वध करुन त्यांची तपश्चर्या भंग करत, त्यांनी दंडकारण्य आपल्या अधिपत्या खाली घेतले आहे.तुला आठवते ना?मागे सीताचे रुप घेऊन बाणासूर आला होता. कोणीही त्याला ओळखु शकले नव्हते. अशा परिस्थितीत तुला तिथे नेऊन तुझा जीव धोक्यात कसा घालू?दोन्ही दरडीवर पाय ठेवल्या नाही ना जात?तुला इजा होण्याच्या नुसत्या कल्पनेनेही मी वेडावतो.तुझ्यापासून दूर राहून विरह सोसेन.रामाने म्हटल्याप्रमाणे,अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचे नियतीला मान्य नसून असूरांचा नायनाट करणं हीच आमची नियती असेल.माझ्या भवितव्याचं काय,असं किंचाळून उर्मिलेला विचारावेसे वाटले, पण कळवळून म्हणाली,तुमच्याशिवाय कोणीच नाही हो..मला तुमची फार गरज आहे…त्यांनी तिला आवेगाने घट्ट मिठीत आवळले.मिऽलाऽ आपल्यासाठी हा विरहाचा क्षण अतिशय कठीण होत आहे.सोपा कर ग…सोपा कर..त्यांच्या व्याकुळ बोलण्याने ती भानावर आली. त्यांना सोडावच लागणार होते.जायलाच हवय!स्वतः कणखर,कठोर होणे भाग होते.प्रेमाचं रुपांतर तिरस्कारात करायला वेळ लागत नाही.आणि तिने तेच शस्र वापरायचे ठरविले.डोळ्यातून दोन मोती निखळले.तिचा वनवास फक्त १४ वर्षानी संपणार होता.डोळ्यातील ते मोती सौभाग्यालंकार म्हणून जपून ठेवत डोळे कोरडे केले.आतल्या कक्षात गेली.सगळा नववधूसारखा साजश्रृंगार करुन बाहेर आली.उर्मिलेचे हे रुप बघून लक्ष्मण अचंबित झाले.विचारले,मिऽलाऽ हे काय काय असणार?हेच माझं जीवन!तुम्हाला माझ्या प्रेमापेक्षा भाऊ जास्त प्रिय,माझा साधा विचारही केला नाही.तुमच्याबरोबर यायच नाही या कल्पनेनं मी सुटकेचा निःश्वास टाकला.बघा..बघा..माझ्याकडे मी राजकन्या,आरामदायी आणि भरभराटीचं जीवन जगण्याची मला संवय!या सर्वाचा त्याग करुन जंगली कंद मुळे खात अनवाणी पायांनी जंगलात हिंडत,गवताच्या शय्येवर झोपायला मी वेडी खुळी वाटले का?हे सर्व ऐकून,रुप पाहून लक्ष्मण थक्क झाले.तिच्या लक्षात आले,त्यांना दुखवण्यात,आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण करण्यात सफल झालोय,ह्रदयातून दुःखाची तीव्र कळ निघाली.मी जेवढं मनापासून तुझ्यावर प्रेम केलं,आतां तेवढाच तिरस्कार वाटतो आपल्या दोघांत न संपणारी दरी तूं निर्माण केलीस.तीने निमुटपणे ऐकुन घेतले,महत् प्रयासाने स्वतःला व अश्रूला आवरुन धरले होते,तोच शब्द कानावर आले,उर्मिला!नेहमीप्रमाणे “मिला” न म्हणतां आज एकांतात पहिल्यांदाच पूर्ण नावाने हाक मारली.म्हणाले,ठीक,होऊ दे तुझ्या मनाप्रमाणे…. उर्मिला म्हणजे मनमोहिनी,जीथे मन मिळतात!उर्मिला म्हणजे उत्कटते च्या लहरी…आणि या क्षणी मात्र उत्कट ता तिच्या कणाकणातून निघून जात होत्या.चैत्यन्य ओसरत होते.मनात केवळ वेदनेच्या लाटा धडका मारत होत्या.तिचा आत्मा जणूं देहातून ओरबडून बाहेर काढला.चैतन्यहीन शरीर..एकटीच ताठ उभी होती. लक्ष्मणाला अतिशय दुःख झालं. जिच्यावर आपण प्राणापलिकडे प्रेम केलं…आतां पुढील जीवन रामाच्या चरणी अर्पण करायचे या दृढ निश्ययाने बाजुच्या कक्षात जाऊन अंगावरील रेशमी वस्रालंकार,मुकुट काढून,वल्कलं धारण केले व चकार शब्दही न उच्चारता

कक्षाबाहेर निघून गेले.उर्मिलेला हेच तर हवं होत..आनंद आणि दुःख अशा दोन्ही संमिश्र भावना डोळ्यातून वाहून गेल्या. अंगावरचे भरजरी वस्रेलंकार उतरवले.. एका वस्रानिशी ती पुढच्या आयुष्याला प्रारंभ करणार होती.आतां खरी सुरुवात झाली तिच्या वनवासाची…उर्मिलेला सतत आयुष्यभर एकच प्रश्न सतावत राहिला…लक्ष्मण कां तिच्या बाह्य रुपाला फसला?कां तिच्यावर विश्वास दाखवला नाही?कां वाटले नाही की,माझी मिला अशी असूंच शकत नाही?की, आपण जसं त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण व्हावा म्हणून असे वागलो, कदाचित ते ही…नाही..नाही.. त्यांच्या डोळ्यात ते दिसलं नाही.तिने जे दाखवलं तेच त्यांनी बघितलं.कां तिचं मन वाचु शकले नाही?खर तर तिने दोघां साठीही सोपं केलं होत.चौदा वर्षे एकमेकांच्या प्रेमात व्याकुळ होण्यापेक्षा तिरस्कारात काढणं अधिक सहज झालं असतं.प्रेमाऐवजी तिरस्कार करणं सोपं जाणार होतं कां?

आपल्या पतीला व बहिणीला निरोप द्यायला येणार नाहीस?निरुपायाने उर्मिला उठली.चल कैकयीच्या महालात. तिथेच तिघेही राजाचा निरोप घ्यायला गेले आहेत.असं म्हणून सुमित्राने तिला जवळ घेतले.उर्मिलाची मनःस्थिती अत्यंत वाईट असली तरी,जाणे भाग होते कैकयीच्या कक्षातील दृष्य बघून ती आवाक् झाली.तिथल्या अंधूक प्रकाशा ला नजर सरावल्यावर तिला दिसले, वर्तुळाकार भव्य मंचकावर राजा गलित गात्र अवस्थेत पडलेले,डोळे खोल गेलेले, नैराश्याची भावना पुरेपुर भरलेली,स्वतः चे पद,अभिमान,लज्जा विसरुन ते धाय मोकलून रडत होते.एक सामर्थ्यशाली राजा निष्प्रभ होऊन पुत्राच्या कुशीत रडत असल्याचे दृष्य बघून कोणाचाही जीव गलबलला असतां.उलट कैकयी ठामपणे उभी होती.आपल्या शोकग्रस्त पित्याचे सांत्वन करण्याचा राम प्रयत्न करीत होते वृध्द राजा कळवळून याचना करीत होते, पुत्रा नको रे जाऊस…माझ्या पाताळयंत्री पत्नीला मी दिलेलं वचन पाळणे तुला बंधनकारक नाही.एक राजपुत्र म्हणून तूं माझ्या राजाज्ञेला आव्हान देऊन राज सिंहासन हस्तगत करुं शकतोस.तसच कर पुत्रा..हे ऐकताच त्वेषाने कैकयी म्हणाली, एका न्याय्य राजा आणि पित्याकडून छान अप्रतिम सल्ला दिल्या जात आहे. आणि महाराज!कोणत्या हक्काबद्दल बोलताय?भरताच्या अनुपस्थितीत रामा ला राजसत्ता देणं,रघुवंश्याच्या दैदिप्यमान इतिहासाला हे शोभून दिसते का?आणि तू ग सीता?अजुन राजवस्रात च?तुलाही वल्कल नेसूनच जावं लागेल. उर्मिला गप्प नाही बसू शकली,ती म्हणाली,सीतेने कांहीही परिधान केले तरी काय फरक पडणार आहे?अरण्यांत ही ती रामाची राणीच असेल.कैकयी संतापून कांही बोलण्याअधीच कठोर स्वरात राम म्हणाले,माते, सत्ता किंवा सिंहासन मिळण्याची हाव मला कधीच नव्हती.मी फक्त पित्याचा आशिर्वाद घेण्यास इथे आलोय!उर्मिला,सीतेला वल्कल नेसवं!मंथरा हातात वल्कलं घेऊन उभीच होती.तिच्याकडे जळजळी त कटाक्ष टाकत वल्कलं हिसकावून घेतली व बाजुच्या कक्षात नेऊन नेसण्यास मदत केली.

उर्मिला,तुझ्या मनातील आक्रदंन मला कळत कां नाही?तुझ्यावरच्या दृढ विश्वासानेच लक्ष्मण इतका कठोर निर्णय घेऊ शकले तसेच तूं खंबीरपणे या कुटुंबा ला सांभाळशील या तुझ्यात असलेल्या सामर्थ्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.ही चौदा वर्ष आपणा सर्वांचीच परीक्षा आहे.सीता तुला एक विनंती आहे, लक्ष्मणासमोर यापुढे माझा विषय काढू नकोस.त्यांना माझी आठवण येईल असे कांही करुं नकोस.सीता गदगदलेल्या स्वरात तिचा हात घट्ट धरुन म्हणाली, माझ्या वनवासापेक्षा तुझा राजप्रसादाती ल वनवास अधिक दुष्कर होणार आहे. उर्मिलाच्या डोळ्यांंत अश्रू तराळले.पण या क्षणी तिला कमजोर होऊन चालणार नव्हते.सीतेला घट्ट मिठी मारत म्हणाली, सीता तूं खूप साधी आहेस.कशावर व कोणावरही पटकण विश्वास टाकतेस. वरच्या रुपाला भाळू नकोस.अरण्याचं विश्व वेगळे आहे.नीट रहा.स्वतःला जप! जा..सीता..जा…सुरक्षित जा व तशीच सुरक्षित परत ये… जा…उर्मिला मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे. माझ्या वृध्द माता पित्यांना तुझ्या स्वाधीन करुन जात आहे.तूं विलक्षण स्री आहेस.तुझ्या शौर्य व धैर्याला तोड नाही. मी मात्र तुझ्या पतीला तुझ्यापासून दूर करुन सहवासाला वंचित करत आहे. मला क्षमा कर!उर्मिला क्षमा कर!रामाचे शब्द ऐकून ऊर्मिला अतिशय संकोच पावली.स्वतःला सावरत म्हणाली, नाही रामजी!तुम्ही माझ्या पतीला उच्च धेय्य पूर्तीसाठी नेत आहात.ते नेहमीच तुमची सावली बनून राहतील.तिच्या डोळ्यातील न ओघळणारे अश्रू मात्र नेमके रामाला दिसले.प्रासादाबाहेर अस्वस्थ प्रजाजन उभे होते.नवीन दिवस नवीन विरह घेऊन आला होता.वृध्द राजाने,वनवासात कोण तीही उणीव भासू नये म्हणून सुमंताला तशी तयारी करण्यास सांगीतल्यावर राम ठामपणे नकार देत म्हणाले,या राज वैभवाची मला आतां आवश्यकता नाही. वल्कले नेसलो तेव्हाच सत्ता,संपती आरामाचा त्याग केला.माझ्या गरजा आतां कमीत कमी असतील.फक्त तुमचा आशिर्वाद असू देत.विरहाच्या तीव्र वेदना सोसणार्‍या या तीन निस्वार्थी स्रीया.. माता कौशल्या,माता सुमित्रा आणि उर्मिला आमच्या अनुपस्थितीत तुमची सेवा करतील.इतके बोलून रामांनी राजाचे चरणस्पर्श केला.रामाचे अनुकर ण लक्ष्मण,सीताने केले.रामाला ऊठवून ह्रदयाशी धरत दशरथ म्हणाले,माझ्या प्रिय पुत्रा,रामा,मला खात्री आहे,अरण्या तही तू आपल्या कुळाचे नांव उंचावशील, गौरवाने परत येशील.कौशल्येने तीघांना पंचारतीने ओवाळले.कीर्तिवंत होऊन परत या.नंतर राम सीताने कैकयीचे चरण स्पर्श केला.लक्ष्मणाची इच्छा नसतांना रामाच्या इशार्‍याने तिच्या पायांना ओझरता स्पर्श केला.

सुमंतांनी रथ सज्ज केला.राम सीता लक्ष्मण रथारुढ झालेत.रथ त्यांना दंडकारण्याजवळ नेऊन सोडणार होता. चौदा वर्षाच्या वनवासाला सुरुवात झाली कौशल्येने दिलेलं शिदोरीचं गाठोडं सीता ने रथात धनुष्यबाणामधे ठेवले.सीताने रामाला विचारले हे धनुष्यबाण कशास्तव शक्ती प्रदर्शनासाठी? अग! गरजुंचं संरक्षण करण क्षत्रिय कर्तव्य आहे.वनात क्रूर असूरांचं वास्तव्य आहे.तिथल्या ऋषींना सतत उपद्रव असतो.त्यांच्या संरक्षणासाठी या शस्रांचा उपयोग होईल. आणि आवश्यकता भासली तर आपलंही….रथ सुरु झाला.हजारो शोकाकुल अयोध्यावासी रथामागुन निघाले.त्यांना हात जोडत विनम्रपणे थांबायला सांगीत ले.सुमतांनी मोठ्या कौशल्याने रथ गर्दी तून बाहेर काढला.उर्मिला सज्जातून पाहत होती.क्षितिजावर धूळीचे लोट दिसत होते.तेवढ्यात प्रासादातून किंकाळी ऐकू आली.तिचे सासरे दशरथ खाली कोसळले होते.त्यांचा लाडका पुत्र त्यांना सोडून गेला होता.त्यांना सावरण्या साठी कैकयी धावली असतां,राजा संतापून उद्गारले,हे विखारी स्रीये,मला स्पर्श सुध्दा करु नकोस.याक्षणापासून मी तुझा त्याग केला आहे.हे पापी चांडाळणी तू आजपासून माझी पत्नी नाहीस. कैकयी जागीच थबकली.

कौसल्येऽऽ त्यांची कारुण्यपूर्ण हाक ऐकून कौसल्या धावली.मला तुझ्या कक्षात घेऊन चल.माझा मृत्युसमय जवळ आलाय!कौसल्याऽऽ माझा रामऽ रामाऽऽ तूं कुठे आहेस?तो वयोवृध्द राजा ढसाढसा रडू लागला.माझा राम नाही.. माझ्या जीवनातील प्रकाशच नाहीसा झाला.चलतांना ते अडखळू लागले. त्यांचा तोल जातसा बघून उर्मिलाने त्यांना सावरले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांना कौसल्याच्या कक्षात नेऊन निजवले. कित्येक प्रहर ते बेशुध्द होते.अवघ्या कांही प्रहरांत कित्येक घडामोडी घडल्या.उर्मिलेला सारं स्वप्नवत वाटत होतं.सकाळी ती युवराज्ञीपदाच्या अभिषेकासाठी सीतेला तयार करत होती अवघ्या कांही प्रहरापूर्वी ती लक्ष्मणाच्या मिठीत होती…कांही क्षण ती तशीच डोळे गच्च मिटून बसून राहिली.डोळे उघडले तर तिच्यासमोर अंधकारमय नवीन जग उभं होतं.म्हटलं तर सारं जागच्या जागीच होत.पण सगळं कसं बदलून गेलं होतं. बर्‍याच वेळानंतर राजा शुध्दीवर आल्याबरोबर माझा राम कुठेय?रामा तू कुठे आहेस?मला कांहीच कसे दिसत नाही?राजा दृष्टी गमावून बसले.हुंदके देत कौसल्या म्हणाली,जिथे मी स्वतःचेच सांत्वन करु शकत नाही तिथे राजाचं कसं करु?अशा विमनस्क कौशल्येला सुमित्राने मोठ्या धीराने सावरलं.सौम्य शब्दात समजावत म्हणाली,कौशल्याताई तूं कशाचा शोक करीत आहेस?अग! तो अरण्यात जाऊन तपस्व्याचं जीवन जगणार आहे.होऊ शकते त्याच्या हातून महान कार्य घडणार असेल हे लक्ष्मणाला दिसल असावं म्हणूनच त्याने रामाच्या पावलावर पाऊल टाकले.सीतेची काळजी तो घेईल.माझ्या धैर्यवान पुत्रांचा मला अभिमान आहे.

जरा उर्मिलाकडे बघ.अजून तिची हळदही निघाली नाही.नवविवाहित असून,पती लक्ष्मणाचा विरह तिला १४ वर्से सहन करायचा आहे.तू एका अद्वितिय पुत्राची माता आहेस व जेष्ठ सुध्दा!तेव्हा पतीला उभारी दे,इतर स्रीयां च्या पाठी उभी रहा.असं कोसळणं अयोध्येच्या महाराणीला,महानायकाच्या मातेला शोभत नाही. त्या संपूर्ण दिवसभरात राजा दशरथ वारंवार बेशुध्द होत होते.नजर गेली,इच्छाशक्ती नष्ट झाली,मन विषण्ण झाले,पण कैकयीबद्दलचा संताप आणि तिरस्कार शमत नव्हता,भेटायला स्पष्ट नकार दिला.अत्यंत कठोर शब्दात तीची निर्भत्सना केली.तरी तिने आत्मसंयम दाखवला.तिने शक्य तेवढ्या लवकर अयोध्येला परतावं असा निरोप भरताला पाठविण्याची सुमंताला आज्ञा केली. लक्ष्मणाच्या विरहात उर्मिला व्याकुळ असली तरी कैकयीत झालेला कायापालट पचनी पडत नव्हता.तिचं रामावरचं प्रेम,मायेची उब अचानकच कशी नाहीशी झाली?यातही कांही राजकीय डाव असेल का?तिचं एकंदर चरित्र पाहतां,ती सत्तालोभी असावीसी वाटत नव्हती.मग हे तिने कशासाठी केल कां इतकी भ्रष्ट झाली असेल?राजकीय सत्ता मिळण्यासाठी इतकं परिवर्तन व्हावं का?मनानं अत्यंत कनवाळू असलेल्या व्यक्तीला दुष्ट करण्याची नैसर्गिक क्षमता केवळ एकाच व्यक्तित आहे…मंथरा!पण कैकयी सारखी धूर्त,हुशार,राजकारणपटू मंथरेच्या सांगण्यात जाईल इतकी लेची पेची ती असेल का?यांत नक्कीच कांही तरी गोम असेल?उर्मिलाचे डोके विचार करुन थकून गेले. गेल्या चार दिवसांपासून राजांनी अन्नपानी त्यागले.त्यांची प्रकृती क्षणा क्षणाला खालावत होती.कैकयीला कक्षात येण्यास बंदी होती.केकय नगरीहू न भरतालाला आणायला दूत रवाना झाले होते.घडलेल्या घटनेबद्दल भरताला चकार शब्दही कळणार नाही अशी सक्त ताकिद देण्यात आली होती.राजाची प्रकृती वेगाने ढासळत होती.अर्धवट ग्लानीत ते सतत रामाला बोलवत होते.. अशा अवस्थेत सुमित्राने निर्णय घेतला. सुंमत अजून परतले नसल्यामुळे,मुनी वसिष्ठांना शांताला बोलावून घेण्यास सांगीतले.सहा दिवसांनी सुमंत एकटेच परत आलेले बघून राजाची उरली सुरली जगण्याची इच्छा नष्ट झाली.सुमंत एकटे आलेले बघून इतके वर्ष मनांत साठलेला संताप कौशल्याच्या मुखावाटे पडला. ती आपला पती मृत्युपंथाला लागला आहे हे ही विसरली.कौशल्येच्या वाक् तांडनामुळे उर्मिलेसह सर्वच हादरले.भकास व अश्रू भरल्या नजरेने मोठ्या कष्टाने राजा म्हणाले,कौसल्या,माझ्या चुकीमुळे तुला ह्या वेदना सोसाव्या लागत आहे.मला मिळालेला शाप खरा ठरणार..मला क्षमा कर!क्षमा कर! राजाचा विकल,विव्हल आवाज ऐकून कौसल्या भानावर आली.पश्चाताप दग्ध स्वरात पतीला माफी मागू लागली. महाराज कोणत्या शापाबद्दल आपण बोलत आहात?मग राजा दशरथाने त्यांच्या तरुणपणी शिकारीला गेले असतां,प्राणी समजून आवाजावर लक्ष्य वेध करण्यात निपून अशी कीर्ती होती, त्यानुसार मी बाण सोडला.पण तो प्राण्या ऐवजी,असाहाय्य,आंधळ्या मातापित्यां चा आधार असलेल्या पुत्राला लागून त्याचा मृत्यु झाला.त्याच्याशिवाय जगण्या त अर्थ नाही असे वाटून, आम्ही जसे पुत्राच्या वियोगात प्राण सोडत आहोत, तशीच वेळ तुझ्यावर येईल असा शाप देऊं त्यांनी प्राणत्याग केला.त्यांचा तो शाप खोटा कसा ठरणार?बोलतांना राजा ला अतिशय कष्ट पडत होते.त्यांची अशी अवस्था बघून,उर्मिला स्वतःला आवरुं नाही शकली.ती तडक कैकयीकक्षात जाऊन,म्हणाली,माते तुम्ही राजाचे प्राण अजूनही वाचवू शकतां.रामाला परत आणण्यासाठी रथ घेऊन सुमंतला पाठव ल्याची राजांना खात्री द्या.त्यांचा जीव वाचेल,आपलं कुटुंब उध्वस्त होण्यापासू न वाचेल.कैकयीवर तिच्या विनवणीचा कांहीही परिणाम झाला नाही.उलट अतिशय थंड स्वरांत विचारले,त्या दोन राण्यांनी पाठवले की,तुझा पती परत यावा म्हणून एवढा आटापिटा चालवला उर्मिलाचा संताप उफाळून आला. म्हणाली,तुम्हाला महात्वाकांक्षेने अंध केले आहे.लक्ष्मण जसे बंधूप्रेमास्तव रामां च्या मागे गेले,तसंच भरतांचही रामावर निर्वाज्य प्रेम आहे,ते कधीच सिंहासन स्विकारणार नाही.तुमचा तिरस्कार करेल पित्याच्या मृत्युचा ठपका ठेवेल.पतीचा वध करणारी स्री म्हणून जग तुमच्याकडे बोट दाखवेल. माते,मी इथे तुमच्याशी भांडायला आले नाही.माझ्या उर्मटपणा,धृष्टतेबद्दल क्षमा मागते.भरत कधीही राजमुकुट स्विकारणार नाही.याक्षणी राजांना वाचव ण्याची निकड लक्षात घेऊन त्यांना सांगा रामाला परत बोलावले आहे.त्यांना धीर द्या.फार उशीर होण्याआधी…उर्मिलाने हात जोडत कैकयीला याचना केली. कैकयीने तिच्या दिशेने पाऊल उचलले, उर्मिलाची आशा पल्लवीत झाली.तेवढ्या एक दासी धापा टाकत येऊन राजाचा काळ झाला हे कसबस सांगून निघून गेली. अयोध्या नगरीत आणि प्रासादात अराजकता माजण्याची भीती निर्माण झाली.कौसल्या सती जाण्याचा हट्ट करीत होती.एकही पुत्र हजर नसल्यामुळे राजाचा अंत्यसंस्कार कसा होणार?अखेर राजाचा मृत देह तेलात बुडवून ठेवण्यात आला. लक्ष्मणाला जाऊन सप्ताह लोटला पण त्यांच्या विरहाचे दुःख करण्याइतका अवधीही उर्मिलेला मिळाला नाही.ती भांबावली.एकाचवेळी तिला अनेक व्यवधानं सांभाळावी लागत होती.तिचा अधिकांश वेळ कौसल्याप्रासादात जात होता.आधी राजाच्या आजारामुळे व आतां ठाव सोडल्यामुळे.आताही कौसल्या अर्धवट शुध्दीत होती.थोडीही जाग आली की,राम आणि दशरथांच्या नावाचा अखंड विलाप सुरु होई.सुदैवाने शांता आल्यामुळे तिला थोडं सहाय्य मिळालं होतं.कैकयीने स्वतःच्या महालात कोंडून घेतले होते.ती भरताच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होती.भरताच्या राज्यभिषेकाची करत असलेली तयारी पाहून शांता म्हणाली,प्रथम भरत आल्या वर पिताजींचा अंतिम संस्कार होईल, त्या नंतर भरत निर्णय घेईल.कैकयी म्हणाली,राजाची विधवा हयात असतांना,मंत्री किंवा राज पुरोहितांनी तिला वगळून,काल आलेल्या नवीन पोरींशी चर्चा करावी हे बरोबर आहे का?शांतपणे राजगुरु म्हणाले….शांतपणे राजगुरु वसिष्ठ म्हणाले, शोकग्रस्त विधवेवर ओझं न टाकण्याची

परंपरा आहे.राजा जनकाची ज्ञानी कन्या, उर्मिला ही राजघराण्यातील राजस्नुषा राज्यातील घडामोडीविषयी बोलू शकते. मुख्य म्हणजे राजाचे पुत्रं आणि त्यांच्या पत्नी उपस्थित नसल्यामुळे तिच्यावरच जबाबदारी येते.तुर्तास तुम्ही शोकगृहात असणे अपेक्षित आहे.राजगुरुच्या स्पष्टोक्तीमुळे ती तिच्या कक्षात निघून गेली.त्यानंतर सुमंत आणि इतर मंत्रीगण जबाली,मार्कंडेय,गौतम,कश्यप आणि कात्यायन विद्वान उपस्थीत होते.आमच्यावर राज्या कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येऊ नये म्हणून,सुमंत उर्मिलाला म्हणाले,तुम्ही राज्यकारभारात लक्ष घालावे.सद्य स्थितीत घडणार्‍या घटनांची इतंभूत माहिती आम्ही वेळोवेळी कळवत जाऊ.

उर्मिलाला वास्तव्याची जाणीव झाली.केवळ राजप्रासादाचीच नाही तर राजकीय घडामोडीकडे लक्ष देण्याचे कार्य तिच्यावर येऊन पडले.यासंबंधी शांताशी बोलल्यावर तिने राज्यासंबंधी कांहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.ती आईच्याच तैनातीत जास्त असायची. जेव्हा ती आपल्या कक्षाकडे निघाली तेव्हा तिला एकटेपणाची जाणीव झाली. गेले कांही दिवसांपासून कौटुंबिक आणि राजकीय कर्तव्ये लिलया हाताळत आहे. तिला आईचे शब्द आठवले.तूं जर आपलं घर व्यवस्थित सांभाळू शकलीस तर जग जिंकू शकशील.किती खरे होते. तिला आईची तीव्र आठवण झाली.आणि कक्षात पोहोचल्यावर डोळ्यावर विश्वास बसेना.समोर आई उभी होती.ती धावत जाऊन आईच्या कुशीत शिरली.कधी आलीस?आणि तात? तुझे तात अंतिम विधीपूर्वी येतील.राम,सीता,लक्ष्मण वनवासाला गेल्याचे कळल्याबरोबर निघाले.तूं इथे कां एकटी राहिलीस? लक्ष्मणाने बरोबर कां नाही नेले?तूं त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न नाही केलास? तुझ्या हक्कासाठी ठामपणे कां उभी राहिली नाहीस? माते,मी आणि सीताने समान तत्व आचरणांत आणलं.आम्ही आमचा धर्म राखला.रामांना वनवासात जाणे भाग होते,सीता पाठोपाठ गेली.बंधू सेवा धर्म लक्ष्मणाला योग्य वाटला म्हणून ते भावाच्या मागून गेले.आणि मी इथे राहायचं मान्य केलं कारन माझा तोच धर्म आहे.इथली काळजी घ्यायला माझ्या शिवाय दुसरं कुणी नव्हतं.तूं आणि तातांनी आमच्यावर हेच संस्कार केलेत ना? योग्य असेल तर पतीला डोळसपणे पाठींबा द्या,चुकत असेल तर त्यांना योग्य मार्गावर आणा.मग लक्ष्मणाचं कांही चुकलं कां? रामांना त्यांची जास्त गरज आहे.मी गेले असते तर,त्यांच चित्त विचलित झालं असतं.माते,प्रत्येकाने आपला धर्म पाळला,तूं कष्टी होऊ नकोस सुनयनाने उर्मिलेला जवळ घेत म्हणाली,मी नेहमीच तुझ्याशी कठोर वागत आले.कदाचित तुझ्याकडून जास्त अपेक्षा असेल,कदाचित तूं माझ्या रक्ता मासांची आहे म्हणूनही…सीता पोटची नव्हती आणि मांडवी श्रुतीका आईविहिन असल्यामुळे त्या तिघींबाबत अधिक मवाळ होते.त्यांचेवर माझा अधिकार नव्हता.तुझ्यात जगात निभाव लागण्यास आवश्यक गुण असल्यामुळे मी निश्चिंत होते.शिवाय त्या तिघींची तूं काळजी घेतली,त्यांना कशाची उणीव भासू दिली नाहीस म्हणूनही कदाचित…माते,तूं लहानपणी मला हे समजावून सांगीतले होतेस,त्यामुळे तुझ्या प्रेमाबद्दल कधीही मला शंका आली नाही,

उर्मिला,तूं अंतर्बाह्य प्रगल्भ असल्यामुळे कनवाळूपणे वागतेस.असो. खरं म्हणजे तुला मिथिलेला नेण्यासाठी आले होते.पण.. मला काय पहायला मिळाले,माझी चिमुरडी लेक आज उमदी स्री झाली आहे.दुःखाचा कडेकोट झाला तरी खचून न जाता खंबीरपणे उभी आहे आलेली परिस्थिती योग्य प्रकारे हाताळले ली बघून मला तुझा अभिमान वाटतो की मी तुझी माता आहे.

राजा दशरथांच्या अंतिम संस्कारा नंतरच सुनयना मिथिलेला परत जायचे ठरविले.भरत-शत्रृघ्न कधी पोहचतात याची सार्‍यांना प्रतिक्षा होती.पित्याचा अचानक मृत्यु किंवा भावाचा वनवास यामागचे कारण भरताला कोण सांगेल हा विचार उर्मिलाच्या मनी आला.दिवस सरतां भरत,शत्रृघ्न नगरीत प्रवेशले.सर्वी कडे त्यांना स्तब्धता दिसली.स्वागताला कुणीही सामोरं गेले नाही.दोघेही पित्याच्या कक्षेकडे जातांना उर्मिलाने बघितले… दशरथ राजांच्या कक्षेकडे गेलेले भरत,शत्रृघ्न त्याच पावली परत फिरुन कैकयीच्या महालाकडे जातांना दिसले. जागोजागी मंगल तोरणांची अर्धवट सजावट होऊ घातलेल्या राज्यभिषेक व झालेला अपमृत्यू लक्षात येत होता. उर्मि,काय झाल?सगळीकडे एवढी भयाण शांतता कां?गवाक्षात उभी असलेली उर्मिला गर्रकन वळली तर, तिच्या कक्षाच्या दारात श्रुतकीर्ती व तिच्या मागे शत्रृघ्न उभा होता.तिथे सुनयनाला बघून कीर्तीला अतिशय आश्चर्य वाटले.श्रुतकीर्तीला बघून आतां पर्यंत दबलेल्या भावना उफाळून आल्या. दोघीही अलिंगनात बध्द झाल्यात.मांडवी कुठेय? ती भरतांबरोबर माता कैकयीला भेटायला गेली आहेत.उर्मि,नेमकं काय घडल?आम्ही नगरात प्रवेश केला तर, स्वागतासाठी कुणी पुढे आलं नाही.उलट जे कोणी समोर आले,त्यांच्या डोळ्यांत निर्भत्सनाच दिसली.विशेषतः भरत आणि मांडवीला बघून…प्रासादातही आमच्या स्वागताला कुणी सामोरे आले.नाही.उर्मि,सांग लवकर माझा जीव टांगणीला लागलाय.असं वाटते,कांही तरी भयंकर विपरित घटना घडली असावी….राम,सीता,लक्ष्मण दिसत नाही कुठे आहेत ते?

उर्मिलाने त्यांना थोडक्यात पण स्पष्ट सर्व सांगीतल्यावर कीर्ती स्तब्ध झाली.शत्रृघ्नचा चेहरा संतापाने लाल झाला.त्याचे हे रुप पाहून उर्मिलाला लक्ष्मणाची आठवण झाली.तर हे सारं त्या दुष्ट मंथरापायी झालं..मी तिला सोडणार नाही म्हणून शत्रृघ्न झपाट्याने निघून गेला.आतां मंथरेचे इथले दिवस संपल्यातच जमा आहे.उर्मिऽऽ मांडवीने आर्त,व्याकुळ स्वरात हाक मारत म्हणाली,लवकर चल, भरतांचा स्वतःवरील ताबा सुटला आहे. कैकयीच्या महालात काय घडले असेल याची कल्पना मांडवीच्या चेहर्‍याकडे पाहताच उर्मिलाच्या लक्षात आले.मांडवी बरोबर कैकयीच्या कक्षात प्रवेश केल्या वर तिथलं दृष्य बघून तिचा थरकाप उडाला.संगमरवरी प्रासादात भरताने स्वतःला जमीनीवर झोकून डोके आपटत होता.उर्मिलेच्या काळजाचा ठोका चुकला.ती व मांडवी भरताच्या दिशेने धावल्या.उर्मिलेला तिथं बघून संतापाने कैकयी कडाडली,तुम्ही दोघींचे इथे येण्याचे धाडसच कसे झाले?माते,भरता ला काय झाले?त्याला नुकतेच सारं सांगीतले…तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.मी त्याची माता,बघेन..माता? माता नाहीस,वैरीण,हत्यारी आहेस,कसे बसे शब्द भरताच्या तोंडून निघाले.तुला माता म्हणायची सुध्दा लाज वाटते.आतां आयुष्यभर हा कलंक मला मिरवावा लागेल.असे म्हणून भरत सरकत असल्याचे बघून उर्मिला दोघांच्यामधे येऊन उभी राहिली.मांडवीने त्याला घट्ट धरुन ठेवले.आवेगाने ओरडत भरत म्हणाला,मी रामाचे राज्य,सिंहासन स्विकारेल असं वाटलच कसं?हे नारी,तूं मलाही स्वतःबरोबर दोषी केलेस.त्याच्या शब्दांच्या भडीमाराने कैकयी थक्क झाली.कठोर चर्या करुन त्याला खडसाव त म्हणाली,अरेऽ तूं मलाच दुषणं देतोस, परंतु तूं इथे नसल्याचा फायदा घेऊन तुला तुझ्या हक्कापासून वंचित केल्या जात होते.कोणत्या हक्काबद्दल बोलतेस तातांनी मातामहांना दिलेले वचन?बदललेली परिस्थिती पाहतां,आता ते सुध्दा अशी मागणी करणार नाही.तातां नी वचन दिले तेव्हा ते निपुत्रिक होते. आम्हा चौघांच्या जन्मानंतर वारसाहक्का ने राम जेष्ठ असल्यामुळे त्याचाच हक्क राजसिंहासनावर आहे.आजपर्यंत तुला सुध्दा स्विकार होते.अचानक तू अशी कां वागलीस?कशाची हाव आहे तुला? योग्यवेळी मी भानावर आले. तूं मातुलगृही गेल्यावर घाईघाईने रामाचा अभिषेक करण्याचे प्रयोजन काय?ते ही मला न सांगता,विश्वासात न घेता..तू जर तातांना विचारले असतेस तर तुला समर्पक उत्तर मिळाले असते.त्यांच वय झालेलं,वारंवार दुःस्वप्ने पडत होते.दिवसें दिवस प्रकृती ढासळत असल्यामुळे धास्तावलेले,कोणत्याही क्षणी मृत्यु येईल याचे भय वाटल्यामुळे त्यांनी सर्वांनुमते निर्णय घेतला.तूं त्यांची पत्नी असून,कसा अविश्वास दाखवलास?तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे सर्वांची आयुष्य उध्वस्त झालीत.तूं माझी माता असूच शकत नाही. भरताच्या अशा बोलण्याने आवाक् झालेली उर्मिबा संतापून म्हणाली,भरताऽ तुम्ही आपल्या मातेशी एवढ्या उध्दटपणे कसे बोलूं शकता?तिने मला कलंक लावला.जगाला तोंड कस दाखवू?हिच्या मुळे माझे दोन्ही भाऊ वनात गेले.त्यांच्या मातांना कोणत्या तोंडाने समोर जाऊ? त्यांच दुःख कसं कमी करु?हिच्या स्वार्थी आणि अविचारी महत्वाकांक्षेपायी तुला १४ वर्षे पतीविरह सहन करावा लागणार कसा तुझ्या समोर उभा राहू?त्याच्या मुखावरिल विवशता बघून उर्मिलेला अतिशय दुःख झाले. माझे दोन्ही भाऊ तातांचे दोन बाहू, नेत्र होते.त्यांना नगरातून बहीष्कृत केल्या वर बिनबोभाट हे राज्य मी करेन असे तुला वाटलेच कसे?मी सुध्दा रामाजवळ वनवासात जाणार… नाही तू अयोध्या सोडून नाही जाऊ शकत..मी नक्की जाणार,माझ्या कुटुबियांना भोगायला लावलेलं दुःख तुला भोगायला लावेन. त्याचा प्रत्येक शब्द तिच्या काळजांत चरे पाडत होते.कैकयीची भयान अवस्था उर्मिलेला पाहवत नव्हती. आजवर शांत, संयमी,सौम्य असलेल्या भरताचं हे रुप तिला अनोखं होतं.सूड,तिरस्कार,वेदनेने तो पेटलेला होता.एरवी मार्दवशील भरत संतापला की,किती निष्ठूर होऊ शकतो याबद्दल लक्ष्मणाने केलेली टिप्पणी तिला आठवली.भरताऽ तुम्ही अयोध्या सोडून गेलात तर तुमचे भाऊ परत येणार आहेत का?त्यातून तुम्ही मातेला वेदना देण्याच्या नादात पत्नीलाही वेदना देत नाही कां?जे माझ्या नशीबी आलं ते निदान मांडवीच्या तरी नशीबी नको ना यायला.मांडवी म्हणाली,मातेने जे केलं ते तुमच्या हिता च्या दृष्टीने केलं,त्यामागे त्यांना मिळाले ला चुकीचा सल्ला कारणीभूत आहे.पण माझ्या भावांना माझी नितांत आवश्यक ता आहे.हळुवार सौम्य शब्दात उर्मिला म्हणाली, भरताऽ आधीच राज्यात अराजकता माजण्याची भीती निर्माण झाली आहे.शत्रू संधीची वाट बघत आहे. तुम्ही गेलात तर अयोध्येचं रक्षण कोण करेल?भरताऽ तुम्हाला इथेच राहून पित्याच्या आज्ञेनुसार राज्यकारभार चालवावा लागेल.

कैकयीने कृतज्ञतेने उर्मिलाकडे बघितले.सर्वांनी किती विनवले होते?स्वतःच्या हाताने पतीला मरणाच्या दाढेत ढकलं होतं.स्वपुत्राकडून तिरस्कार,नकार धिक्कार मिळाल्याने कैकयी अगतिक झाली होती.ज्या पुत्रासाठी एवढं घृणास्पद कृत्य केलं,तोच पुत्र तिची अवहेलना करीत होता.यामुळे तिच्या वाट्याला निव्वळ अपकीर्ती आली होती. उर्मिलाचे बोलणे ऐकून भरताने शांतपणे विचार केला.तिच्या बोलण्यात तथ्य आहे हे तिला पटले.स्वतःला सावर त तो सयंतपणे म्हणाला,पिताश्रींनी राज्य करण्याचा आदेश दिला,रामाला १४ वर्षे वनवासात पाठवलं… राज्य करील पण, माझ्या पध्दतीने…त्यासाठी एकच मार्ग आहे,रामाला परत आणून,राज्य त्याच्या सुपूर्द करणे.माझ्या पित्याचे अंतिम संस्कार झाल्यावर रामाला परत आणून सिंहासन त्याला परत करेन.जा..भरता जा..कैकयी म्हणाली, पुत्रा त्यायोगे तुझा गेलेला सन्मान,आदर,विश्वास प्रजेकडून प्राप्त होईल.माते,एकवेळ गेलेला सन्मान शेकडो सस्कृत्य केली तरी परत मिळणार नाही.केवळ माझं जगणं सुसह्य व्हावं म्हणून…माझ्या दोन्ही मातांना सोबत…. पुत्रा,मी सुध्दा…नाही ..तूं नाही…तुझा पुत्र म्हणून जन्माला आलो हे माझं दुर्देव!

तूं केलेल्या पापाचं प्रायश्चित मलाच घ्यायच आहे.अजच्या नंतर मी तुझा पुत्र नाही,तूं माझी माता नाहीस.हे ऐकताच ती हुंदके देत रडू लागली.आजवर प्रबळ असणारी महाराणी कैकयी तिच्याच पुत्रा च्या हातून उध्वस्त होत होती.तिचा सन्मान स्वाभिमान सारच हिरावल्या गेलं होतं.फारच विदारक दृष्य होतं.यापुढे कोणीही आपल्या कन्येचे नांव कैकयी ठेवणार नाही.भरताने निष्ठूर पणे शाप दिला व तडक निघून गेला. निदान आता तरी शांताचा त्याचेवर विश्वास बसेल असे उर्मिलाला वाटत होते

अचानक जोरात किंकाळी आली म्हणून सर्वांनी वळून पाहिले तर,शत्रृघ्न मंथरेच्या केसांना धरुन फरफटत आणतां ना दिसला.त्याने तिला भरताच्या पायावर ढकलले,त्याने हात उगारल्यावर भरत त्याला सावध करत म्हणाला,नाही..स्री वर हात उगारुं नये,रामाला आवडणार नाही.आणि तू हा अपराध करावास एवढी तरी तिची पात्रता आहे कां?मला तर तिचं मस्तक उडवायची इच्छा होत आहे.कैकयी तिला वाचवत म्हणाली, शत्रृघ्ना,असं करुं नकोस,ती मला माते समान आहे. कोणती माता?ती? जे अर्धसत्य किंबहुना असत्य सांगीतलं ती?आमच्या पेक्षा तिच्यावर तुझं जास्त प्रेम आहे का? भरता,हिला आतांच्या आतां हाकलून दे, नाही तर मी तिला संपवतो.पण तिने दायी म्हणून लहानपणी त्याचं केललं संगोपन आठवून शुध्द मनाचा भरत तिला कठोर शासन करुं शकणार नाही हे मंथरा पुरते ओळखून असल्यामुळे ती योग्य ठीकाणी आली होती. कठोर आवाजांत उर्मिला म्हणाली, भरता अधी तिला बाहेर काढा,ताटीकाही स्री होती तरी रामाने तिचा वध केलाच ना! उर्मिला म्हणाली! ही विषवल्ली आहे.आपल्या प्रत्येकाला ती भ्रष्ट करीत आहे.आणि त्यात ती यशस्वीसुध्दा होत आहे.तुमच्या मातेचं अंतःकरण हिनेच मलिन केलं आहे.या सार्‍या कारस्थाना मागे हीच आहे.प्रासादातील प्रत्येकाचे मन कित्येक काळापासून कलुषित करीत आहे,याला मांडवीने सुध्दा दुजोरा दिला. ही अत्यंत विखारी आहे.हीच्या आहारी जाऊन,माझ्या प्रिय बहिणींबद्दल दुराग्रह करुन त्यांच्यापासून दुरावली.हीला आतांच इथून घालवा.मांडवीच्या बोलण्याला पुष्टी देत उर्मिला म्हणाली हिने आम्हा बहिणींशी असेच वर्तन केलं. तुम्हा भावांमधे फूट पाडण्याचे प्रयत्न केले,पण तिला साध्य झाले नाही.यापूर्वी आधीच नाजूक असलेल्या संबंधात हिने तिन्ही मातांच्या मनामधे दरी निर्माण केली.सर्वात आधी तुमची माता बळी पडली. माता कैकयी तुमच्या कधीच लक्षात आलं नाही?कुठली माता स्वतः च्या हाताने स्वतःचं कुटुंब उध्वस्त करायला लावेल? कैकयी मंथरेसमोर येऊन म्हणाली, मी तुला मातेच्या ठायी समजून,सर्वांचा विरोध पत्करुन तुझी बाजू घेत राहिली, तुझ्यावर निरतिशय प्रेम केलं,कारण मला माता नव्हती.तूं शरीराने जेवढी कुरुप तेवढीच मनाने घृणास्पद अशी कुब्जा आहेस.तुझ्या रक्ताने माझे हात रंगण्या आधी तूं इथून चालती हो..

उर्मिला संतापाने म्हणाली,नाही माता कैकयी..इतक्या सहजा सहजी हिची सुटका होता कामा नये.खरंतर हिला मृत्युदंडच द्यायला हवा,पण..इथून दूर कुठे पाठवलं तर,तिथल्या लोकांची मने नासवून त्यांच्या आनंदाला चूड लावेल.हिच्यासाठी एकच योग्य जागा आहे अंधार कोठडी.१४ वर्षानंतर सह्रदयी राम करेल तिची मुक्तता.मंथरेने उर्मिलाची खूप क्षमायाचना केली पण, रक्षकांना बोलावून मंथरासह तिच्या हेरांनाही आंधारकोठडीत रवाना केले. प्रसंगी उर्मिला किती कठोर होऊ शकते हे मांडवी प्रथमच बघत होती.उर्मिलाची कर्तव्यतत्परता पाहून सारेच आवाक झालेत.मंथरेला रक्षक घेऊन गेल्यावर, गंभीरपणे उभ्या असलेल्या भरताला सहज स्वरात उर्मिला म्हणाली,भरता! मधे अनेक अडथळे आल्यामुळे आधीच दोन्ही मातांना भेटायला विलंब झाला.त्या उत्कटतेने वाट बघत आहे.त्यांची भेट घ्या नंतर शत्रृघ्नला म्हणाली,गुरु वसिष्ठांना निरोप द्या,आजच अंतिम संस्कार करायचे आहे आणखी उशीर नको.मृत सम्राटाचा अंत्यविधी त्यांच्या दोन कनिष्ठ पुत्रांच्या हस्ते पार पडला.पित्याचा मृत्यु आणि बंधूंचा वनवास,दोघांनाही दुःख आवरेनासे झाले.त्यांची मोठी बहिण शांताने त्यांचे सांत्वन केल्यावर तिच्या कुशीत शिरुन भरत ढसाढसा रडला. सिंहासनाचा अव्हेर करुन भरताने शांता च्या नजरेत भरताने आपले नैतिक मुल्य वाढवले.

भरताने राज्यकारभारात लक्ष घालायला सुरुवात केली.कैकयीने स्वतः ला कोंडून घेतले.कौसल्याची प्रकृती तोलामासा झाली होती.तिला सतत नैराश्याचे झटके येत होते.सुमित्रा तिची योग्य काळजी घेत होती.प्रत्येक राणी आपल्या दुःखात चुर होती.उर्मिलाचीही अवस्था वेगळी नव्हती.लक्ष्मणाच्या आठवणीने ती गलबलून जात असे.

उर्मिऽऽ !हाकेसरशी ती भानावर आली.मांडवी आणि कीर्ती तिच्या कक्षात आल्या होत्या.त्याच्यामुळे तिचं जीवन थोडं तरी सुसह्य झाल होतं.या..ग!मांडवी ला आवेग असह्य झाला,म्हणाली,तू नसतीस तर भरताला मी कसं सांभाळलं असतं?ते अगदी उन्मळून पडले होते. ऊर्मि,कैकयी माता तुझ्याशी इतकी वाईट वागली तरी तूं शांत कशी?तुझी अवस्था किती बिकट झाली असेल?तो भयप्रद प्रसंग,ताण,धक्का,भीषणता एकटीने कसा सहन केला ग?लक्ष्मण,सीतावर तुझे सर्वाधिक प्रेम,त्यांचा विरह कसा स्विकारलास?एवढं सारं सोसून खंबीर पणे उभी आहेस.कसं जमत उर्मि तुला? उर्मिला म्हणाली,मांडवी सध्या भरताला तुझी नितांत गरज आहे.राम नसल्यामुळे ते दिशाहीन झाले असतील,त्यांना बाहेर काढण्यासाठी तुला खंबीर व्हावं लागेल.

औशाचे चौदा दिवस संपले.शत्रृघ्न च्या मदतीने उर्मिला राज्यकारभाराकडे लक्ष देऊ लागली.सर्व मंत्री व गुरुजनांना राजसभेत पाचारण करुन,सयंतपणे उर्मिला म्हणाली,महाराज दशरथांच्या आदेशा नुसार भरताने राज्यकारभाराची सुत्रे हाती घ्यावी.राज्य राजाशिवाय जास्त दिवस रिक्त नसावे.भरताच्या राज्या भिषेकाची सिध्दता करावी.सर्वांनी सहमती दर्शवली.भरत म्हणाले,हे सिंहासन माझे नाही.मला ते स्विकारण्याचा आग्रह करुं नये.सर्वांना वाटते मी या कटात सामील आहे.सर्वांचा विश्वास प्राप्त करणे महत्वाचे आहे.रामाला परत आणून त्याला सिंहासनावर बसवल्यानंतरच मी राजचिन्हांकित वस्राभुषणे धारण करीन.

भरताचे मनापासूनचे बोलणे ऐकून सर्वांचे मत त्याच्याविषयी प्रतिकुल झाले.उर्मिलेने सुटकेचा निःश्वास सोडला. भरत सुमंताला म्हणाले,उद्याच प्रस्थान करायच्या दृष्टीने तयारी करा.दोन्ही माता, सर्व गुरुवर्य,व तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी विनंती करतो.राणी कैकयी इथेच थांबेल.सभा संपल्यावर उर्मिला तिच्या प्रासादाकडे निघाली असतां,भरताने तिला अडवत म्हणाले,मला क्षमा कर! कशाबद्दल?तुमच्याबद्दल माझ्या मनांत कधीच अविश्वास नव्हता.जे घडलं त्यात तुमचा सहभाग नव्हता हे जसं मला माहित आहे,तसच लवकरच जगालाही कळेल.रामाप्रती तुमची निष्ठा सर्वश्रुत आहे.उर्मिला,या सार्‍यात तूं जास्त दुखावल्या गेली आहेस,तेही माझ्या माते मुळे.नाही भरता! रामामागे जाण्याचा निर्णय सर्वस्वी स्वतः लक्ष्मणाचा होता. मातेला दोष देऊ नका. नाही उर्मिला,या सर्वासाठी मी अपराधी आहे.रामाला परत आणणे माझे एकमेव ध्येय आहे.तो परत नाही आला तर मी ही तिथेच थांबेन.भरत स्वतःची ज्या प्रकारे अवहेलना करीत होता,ते पाहून उर्मिला कळवळली.म्हणाली,तुम्ही कांहीच केले नाही,नका स्वतःवर अन्याय करु.मग राम,लक्ष्मण,सीतानेही अपराध केलेला नाही.कुणी तरी केलेल्या पापाचं मुल्य आपण सारेच चुकवत आहोत,तूंं येणार ना बरोबर?ऐकून लक्ष्मणाची भेट होईल याचा तिला आनंद झाला,पण लगेच भानावर आली.आवंढा गिळत मोठ्या कष्टाने नकार देत म्हणाली,तुम्ही च त्यांना परत आणा.सोबत चलण्याचा आग्रह करुं नका.भरता!तुमच्याप्रमाणेच कैकयीमाता पश्चातापाच्या आगीत होरपळत आहे.तीला सोबत न्या.एक संधी…शक्य नाही.उर्मिला शांतपणे म्हणाली,घेऊन जा

भरता!कदाचित तीच रामाचे परत येण्यासाठी मन वळवू शकेल राम परत येईल हे इतके सोपे वाटते का तुला?पित्याला दिलेलं वचन जपनं हाच रामाचा सन्मान आहे.म्हणूनच कैकयी मातेला सोबत न्या.कदाचित…

सर्वांनुमते गुरु वसिष्ठ,तीन राण्या, भरत शत्रृघ्न,या सर्वानी जायचे निश्चित केले.उर्मिला येत असली तरच आपण जाऊ अशी अट सुमित्राने घातल्यामुळे उर्मिलाची द्विधा मनःस्थिती झाली.तिच्या मनात वादळ ऊठलं.तिने स्वतःला सावरत म्हणाली,आतां परत निरोप घेणे मला सहन होणार नाही.परत मला त्या सार्‍यातून जायला नका हो भाग पाडू! निदान त्याची भेट घेण्यासाठीच चल. पुढील वियोगाचा प्रदीर्घ काळ सहन करण्याचे धैर्य तुला मिळेल.अखेर जाण्यास तयार झाली.

चित्रकुट पर्वतावर चढणारा लवाजमा,भरताच्या रथावर फडकणारा ध्वज,अश्वदल,गजदल,मेणे,अनेक रथ पाहून कुटीबाहेर उभ्या असलेल्या लक्ष्मणाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या इतक्या दुरुनही उर्मिलेला स्पष्ट दिसल्या. त्यांची विचारपध्दती लक्षात घेता,भरत त्यांचा पडाव करण्याकरीतांच येत आहे असा संशय आला असणार.निरपराध भरत व त्यांच्यामधे रक्तरंजित युध्द होणार की काय ही भीती तिच्या मनांत डोकावली.पण क्षणभरच!राम कदापी होऊ देणार नाही याची खात्री होती.

सर्व लवाजमा,तीन राण्यांसह उर्मिलाही रामाच्या कुटीजवळ पोहचले. रामाला पित्याच्या मृत्युची खबर ऐकून अतिशय दुःख झाले.विधवा वेषात राण्यां ना बघून सीता श्वास घ्यायचीच विसरली. समोर पुत्राला बघून कौसल्याने रामाकडे धाव घेतली,त्यांच्या कणखर मिठीत ती धाय मोकलून रडू लागली.लक्ष्मण आपल्या मातेकडे गेले.इतक्या दिवसांत प्रथमच सुमित्रा अश्रू ढाळू लागली.

जेष्ठपुत्र या नात्याने मंदाकिनी नदी तीरी चारही भावांनी मृत पित्याच्या आत्माच्या मुक्तीसाठी यथायोग्य विधी पार पाडल्यावर शोकाकुल मनःस्थितीत सर्वजण कुटीत परत आले.उर्मिलाने सीते ला घट्ट मिठी मारली.सीता म्हणाली, किती एकटी पडलीस ग तू!स्वतःचे दुःख बाजूला ठेवून खंबीरपणे सर्वांना आधार दिलास.पण कधी चकार शब्दही उच्चारला नसशील,निष्कारण तुला विरह यातना भोगाव्या लागत आहे.ती बोलत सीतेशी असली तरी तिचे सारे लक्ष लक्ष्मणाकडे लागले होते.आपण इथे येण्यात चुक तर केली नाही ना?रामाने अयोध्येस परतण्यासाठी त्यांच मन वळव ण्यासाठी सर्वजण आले होते.आपण मात्र केवळ लक्ष्मणाला पहायला आलोय शत्रृघ्नशी बोलत असणार्‍या आपल्या पतीकडे तिने बघितले.त्याला बघून एक मासाहून अधिक काळ लोटला होता.निघतांना रथावर आरुढ झाल्यावर एकदाही त्यांनी मागे वळून बघीतले नव्हते.तो त्यांचा शेवटचा निरोप होता कां आपण आलेलं त्यांना आवडलं नसेल कां भेटण्याची इच्छा नसेल का?गेल्या कित्येक दिवसांचा मनावरील ताण सहन करत असल्यामुळे आतां आणखी सहन शक्ती नव्हती तिच्यात…. लक्ष्मण इकडेच येतांना पाहून, कैकयीमातेची भेट घेते म्हणून सीता लगबगीने उठून गेली.लक्ष्मण समीप आल्यावर उर्मिलेच्या मनात शंका डोकावली ,आपल्याला इथे पाहून चिडले तर नसतील ना?तिला हळूवार आवाजात लक्ष्मण म्हणाले,मी एवढा भयावह दिसतो का?धास्तावून बघत आहेस.हे ऐकताच तिचे गाल आरक्त झाले.धास्ताव ले नाही,पण मी इथे आलेले तुम्हाला आवडले नसावं अशी भीती वाटत होती. असं कां म्हणतेस?उलट तुला बघून खुप आनंद झाला.मिला,तुम्ही सर्वजण कां आलात?रामाला स्वगृही नेण्यासाठी. त्यांचेवर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करणं भरताचं एकमेव ध्येय आहे.राजपद स्विकारायला त्यांनी ठाम नकार दिलाय! लक्ष्मण म्हणाले,मला नाही वाटत राम परत जाईल.पित्याला दिलेलं वचन तो कधीच मोडणार नाही.कैकयीमातेने विनवले तरीही? होय!तुमचं काय? निःश्वास सोडत लक्ष्मण म्हणाले,मिला ज्याचं उत्तर मी देऊ शकत नाही असे प्रश्न विचारु नकोस.तुला इथे अनपेक्षित बघून फार आनंद झाला.तुला डोळे भरुन पाहू दे मिला.तूं जेवढी सुंदर आहेस,तेवढीच कणखर व विद्वानही!मला तुझा इतका अभिमान वाटतो की,तुझ्यापुढे खुजा वाटतो.माता सुमित्रा,भरत,शत्रृघ्न कडून तुझ्याबद्दल सर्व समजले आहे.अचानक कोसळलेल्या विपत्तीमधे तूं कशी ठाम उभी राहून,एखादी खवळलेली सिंहीण जशी इपल्या शावकाचं रक्षण करेल तसचं तूं आपल्या कुटुंबाचं केलस.कर्तव्य दक्ष स्नुषा,धूर्त प्रशासक,चतूर शांतीदूत अशा विविध भूमिका एकाचवेळी पार पाडल्यास.मी मात्र वेदनेशिवाय तुला कांहीच दिले नाही.असं कां म्हणता?तुम्ही जसं तुमचं कर्तव्य पार पाडत आहात तसच माझ!तुम्ही स्वतःचा विचार न करतां,निःस्वार्थपणे राम,सीताची सेवा करतां,मला अभिमान आहे.मिला,तू खरच आलीस?मी स्वप्नात तर नाही ना? मिला,तुझी आठवण येऊ नये म्हणून पराकोटीचे शारिरीक श्रम करतो तरी सुध्दा क्षणभरही विसर पडत नाही.तूं सोबत असल्याची भावना जाणवते. आणि शांत होतो.दैवानं हिरावलेल्या क्षणांची जाणीव होऊन एकमेकांकडे पाहत असतांनाच शत्रृघ्न विशीष्ट चर्चा करण्यासाठी रामकुटीत बोलवायला आला.रामकुटीत सर्व विराजमान झाल्या वर,रामाने प्रश्न केला,भरता,राजकर्तव्या कडे दुर्लक्ष करुन ससैन्य इथे कां आलास बंधू,तूं राजकर्तव्याचा उल्लेख केलास, पण मी राजा नाही.राजा तूं आहेस.तुला विनंती नव्हे याचना करण्यास आलोय!तूं आमच्यासवे येऊन राजपदाचा स्विकार कर,तो तुझाच अधिकार आहे.नाही!तातांच्या इच्छेनुसार ते हा अधिकार कुणालाही देऊ शकत होते. आणि त्यांनी तुझी निवड.. त्यांच वाक्य मधेच तोडून भरत म्हणाले,ते सर्व त्यांच्या इच्छेविरुध्द झाले हे तुलाही माहित आहे. राजमुकुट शिरावर घेण्यापासून माझी मुक्तता कर.विश्वासघातकी म्हणून होणार्‍या संभवणातून मला मोकळं कर! भरताच्या प्रत्येक शब्दागणिक रामाचा निश्चय अधिक दृढ झाला.वनात जशी मला लक्ष्मणाची साथ आहे,तशीच तुला शत्रृघ्नची राज्यकारभारात मिळेल.आपण दोघेही ठरवलेल्या मार्गाने जाऊयात.शेवटी राजगुरु वसिष्ठ हस्तक्षेप करीत म्हणाले,मी राजगुरु या नात्याने सांगतो,तूं अयोध्येत येऊन सिंहासनाचा स्विकार कर.तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता राजा दशरथांच्या मृत्युमुळे फार मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे.गुरुवर्य!मी पिताश्रींना दिलेले वचन मला पाळावेच लागेल.कैकयी म्हणाली,ते वचन त्यांनी मला दिले होते,ते मी परत घेऊ शकत नाही कां?माझ्या पापाचं परिमार्जन होऊ शकत नाही का?पुत्रा,माझे अपराध पोटात घाल आणि स्वगृही परत चल. माते,मी कोणालाही दोषी समजत नाही. निश्चितच भविष्यात कांही तरी कारण असेल.नियतीने ठरवल्याप्रमाणे मला वागू दे.भरतही तेवढ्याच ठामपणे म्हणाले,जोवर तूं अयोध्येत परत येत नाही,तोवर मी अन्नत्याग करीन.भरताऽ असा बालिशपणा नको करुस.धर्माला अनुसरुन तात्काळ परत जाऊन योग्य प्रकारे राज्य सांभाळ कठोर शब्दात राम म्हणाले.भरत म्हणाले,तातांचे वचनच पाळायचे तर मी वनवास पत्करतो तू राजसिंहासन ग्रहण कर!

दोघां भावांमधील वाद संपण्याचे चिन्हे दिसेना तेव्हा गुरु वसिष्ठांनी मधला मार्ग काढत म्हणाले,भरत रामाचा प्रतिनिधी म्हणून राज्य सांभाळेल आणि १४ वर्ष वनात राम पूर्ण करेल.शेवटी अनिच्छेने भरतने रामाच्या पादुका मागीतला.त्या सिंहासनावर ठेवून तुझ्या वतीने रामराज्य सांभाळेन आणि तूं येई पर्यंत शरयू नदीच्या तीरावर संन्यस्त जीवन कंठीत नंदीग्रामात वास्तव्य करेन. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे १४ वर्षे संपल्याबरोबर तूं प्रथम माझ्याकडे येशील अन्यथा मी प्राणत्याग करेन…..हे ऐकून उर्मिला संतापली.जे तिच्या नशीबी आलं तेच मांडवीच्या बाबतीत घडणार.आवेगाने ती कडाडली. भरता, झालं ना तुमच्या मनाप्रमाणे.राम व लक्ष्मणा प्रमाणे तुम्हीही सन्यस्त जीवन जगा.या कालावधीत तुमच्या पत्नीची, कुटुंबाची कांही कां अवस्था होई ना तुम्हा ला काय देणं घेणं.आज इथे सर्वच धर्मा च्या गोष्टी करत आहेत,पत्नीप्रती कांहीच धर्म नाही कां?धर्म फक्त पिता,पुत्र,बंधू बाबतच पाळायचा असतो कां?उर्मिलेच्या आवेशपूर्ण संतापी बोलणे ऐकून गुरु कश्यप म्हणाले,ही जनकांची राजसभा नाही.तिथे बायका वादविवाद,चर्चा करुं शकतात,तसं इथे होणार नाही.उर्मिलाचा चेहरा संतापाने लाल झाला तरी संयम ठेवत म्हणाली, गुरुदेव!मी फक्त जनकराजाचीच कन्या नाही तर,सुप्रसिध्द इक्ष्वाकू कुळाची सून आहे.त्या नात्याने मी एक प्रश्न विचारते, पत्नीप्रती व मातेप्रती काय धर्म आहे? ते निरुत्तर झाले.म्हणाले,इथे वैयक्तीक चर्चा नको.राजा दशसथांनी पत्नीच्या इच्छेला मान देऊन रामाला १४ वर्षे वनवासात पाठवले.मग रामाऐवजी आपला पुत्र भरतासाठी राज्य मागीतले हे वैयक्तीक नाही का?राजाज्ञेविरुध्द बंड करण्याचे सामर्थ्य लक्ष्मणांत असून देखील ते रामा बरोबर वनवासात गेले.भरतांनी इथे येऊन रामांना परतण्याचा आग्रह करत आहेत हे वैयक्तीक नाही कां? मी परत परत विचारेन,पत्नी आणि मातेप्रती पुरुषाचे कांहीच कर्तव्य नसतात कां? आपल्या पुत्रांचं दुःख सहन करणे राण्यांच्या नशीबात कां?माता कौसल्याच्या आयुष्यात कोणी शांती व अर्थ देऊ शकेल कां? माता सुमित्राचे मूक अश्रू कुणाला दिसतील कां? माता कैकयीचा दुष्टपणा तेवढा दिसतो पण तीला होणारा पश्चाताप आणि अश्रू कुणालाच दिसत नाही का?राज्य आणि प्रजाजन यांचेबाबतीत न्याय्य भूमिका घेण्याबाबत हे घराणे सुप्रसिध्द आहे, मात्र कुटुंबियांच्या बाबतीत विशेषतः स्रीयांच्या बाबतीत सर्वाधिक क्रौर्याने वागतात.न्याय केवळ आंधळाच नाही तर मुका बहिराही होतो.आज प्रत्येक व्यक्ती माता कैकयीचे वाभाडे काढत आहे,पण जेव्हा तीने आपल्या दोन वरदानांची मागणी केली,तेव्हाकां कोणीच विरोधात उभं राहिलं नाही.दोन राण्या, मंत्रीगण, राजगुरु, आणि सर्व गुरुवर्य,सर्व जेष्ठ मंडळी काय करत होती?कां कोणीच खंडण केलं नाही?रामांनी गृहत्याग करु नये.म्हणून कोणीच कां नाही थांबवले?वनात असुरांच भय,धोका आहे हे माहित असून ही सीताला थांबवण्याचा कां प्रयत्न केला नाही?त्यावर सीता कांही बोलणार हे लक्षात आल्यावर आधीच उर्मिला म्हणाली,तूं म्हणशील हा माझा ऐच्छिक निर्णय होता.राम लक्ष्मणांचही तेच म्हणणं असेल पण,असे निघून गेल्यावर तुमच्या माघारी तुमचे कर्तव्य ज्यांना पार पाडावी लागणार आणि ज्यांना तुम्ही मागे सोडले त्यांचा विचार केला कां?विवाहात दिलेली वचने जर पाळायची नव्हती तर कां विवाहबध्द झालात?कदाचित तुम्ही सर्वौत्तम राजपुत्र सर्वोत्तम पुत्र,आदर्श बंधू आणि आदर्श राजे असालही,परंतु आदर्श पती मात्र नाही.त्याच त्वेषात उर्मिला म्हणाली, गुरुवर्य कश्यपजी,आपण म्हणालात ते योग्य आहे.अयोध्या मिथिला होऊ शकत नाही.मिथिला स्रीयांना इतकं अनादारानं कधीच वागवत नाही.कोणत्याही क्षणी रडू कोसळेलसे वाटल्याने ती कुटीबाहेर निघून गेली.मिला थांब!अशी माझ्यापासून पळून जाऊ नकोस.हे ऐकताच त्यांच्या संतापाचा सामना करावा लागेल म्हणून तयार होऊन गर्रकन मागे वळली.कुटी मधे तिचा उद्रेक होत असतांना लक्ष्मण अवाक्षरही बोलले नव्हते.त्यांच्या चेहर्‍या वरचे हसू बघून ती आवाक् झाली.तुम्ही कां हसतां?मी जे बोलले त्याचा मला मुळीच पश्चाताप नाही.मी हे सर्व मांडवी करितां बोलले,अर्थात त्याचा उपयोग होणार नाही हे जाणून आहे.नाही मिला, मी हसत नाहीय.अखेर तूं व्यक्त झालीस तर!तुझा प्रत्येक मुद्दा मला आवडला. तूं माझी शूरवीर पत्नी आहेस.पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो.असं बोलण्याचं धारिष्ट्य केवळ तुझ्यातच आहे.राज्यभिषे काच्या त्या दिवशी आपल्यात किंचित झालेल्या वादानंतर तूं व्यक्त होण्याची वाट बघत होतो.त्यांच असलेलं आत्यांतिक प्रेम बघून ती कासावीस झाली.ते पुन्हा दूर जाणार होते.पुन्हा हा प्रदीर्घ निरोप ठरणार होता.चौदा वर्ष सातत्याने होऊ घातलेला विरह,मनांत साचलेला संताप,तिरस्कार, चिंता,भ्रमनिरस या सार्‍यांचा उद्रेक, निचरा झाल्यामुळे उर्मिलाला आतां मोकळं मोकळं वाटत होतं.येणारा हुंदका दाबत म्हणाली,आतां मी अंतर्बाह्य शुध्द झाले.आतां केवळ डोळे मिटून गाढ झोपी जायचय!घोगर्‍या आवाजात लक्ष्मण म्हणाले,तुझी झोप माझ्या बरोबर असावीशी वाटते.म्हणजे तुम्ही प्रत्येक रात्री निद्राधीन होतील,तेव्हा दक्ष राहाल. झोपेच्या मोबदल्यात माझी विश्रांती, सहजता आणि प्रेम देते,चालेल मिला! मला ही झोप नेहमीच त्रासदायक वाटते. व्यक्ती कितीही समर्थ असला तरी,झोपे साठी त्याला आडवं व्हावच लागते.हे ऐकून तिला खुदकन हसू आले.तिचे हसू बघून लक्ष्मण म्हणाले,प्रिये,अशीच हसत रहा असे म्हणून वेदनेने पिळवटल्या मुखा ने वळून चालूं लागले.तिने डोळे मिटून घेतले.नैराशग्रस्त भविष्य तिच्यासमोर उभं होतं.तिची प्रदीर्घ झोप आता सुरु झाली होती.उर्मिला चित्र रंगवित होती. कुंचला झरझर फिरत होता आणि विचार ही!लक्ष्मणाचे विचार तिच्या मनांतून क्षण भरही दूर होत नव्हते.समोरच्या ताटातील एकही घास पोटात गेला नव्हता.राज परिवारात प्रत्येकाचीच अशी अवस्था होती.एकत्र भोजन घेणे भूतकाळात जमा झाले होते.प्रत्येकाने आपल्या कक्षा त कोंडून घेतले होते.नंदीग्रामला जाऊन भरताला तीन महिने झाले होते.मांडवीला त्याच्या निर्णयाने धक्का बसला होता. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवतेवेळी ती उपस्थित नव्हती,त्यामुळे मंत्रीगण नाराज झाले होते.स्वघोषित संन्यास्ततत्व अवलंबवल्यावर भरताने वल्कलं धारण केले होते.त्यावेषात भरताला बघून मांडवीला अतिशय वाईट वाटले.नेमकं दोघांमधे काय झालं हे कोणालाच कळलं नाही मात्र त्या दिवसापासून मांडवीने स्वतःला घट्ट मिटून घेतले.बाह्य जगाशी संबंध तोडून टाकले.तिला या अवस्थेतून बाहेर काढण्याचा कीर्ती व उर्मिलाने आटोकाट प्रयत्न केला,पण व्यर्थ!शत्रृघ्न मात्र सर्वाधिक व्यस्त होता.राज्यकारभारात लक्ष घालणे,रात्री नगरातून फेरफटका मारणं हा त्याचा नित्य परिपाठ होता.तरी वेळात वेळ तीन्ही मातांसाठी काढत होता.चित्रकुट पर्वताहून रामाची भेट घेऊन आल्यावर कौसल्याची प्रकृती अधिक खालावली.दुःखामुळे प्रत्येकजण हरवल्यासारखा झाला होता.उर्मिलाही दुःखाने थकली होती.पण तिने या दुःखद एकांतातून बाहेर पडण्याचे ठरविले. सकाळी ती उपनिषद,वेदांचा अभ्यास करीत असे.गुरु वसिष्ठासमवेत अध्ययन, नंतर चित्र रंगवण्यात वेळ घालवी.

एक दिवस ती अशीच चित्र रंगवित बसली असतां,तिला विवाहानंतर ची गोष्ट आठवली.दासीने भोजनाचे ताट त्यांच्या कक्षात आणल्यावर,उर्मिलाने विचारले,इथे एकत्र बसून भोजन करण्या चा प्रघात नाही का?लक्ष्मण निर्विकार पणे म्हणाले,आम्ही आपपल्या कक्षातच जेवन घेतो.महाराज मात्र रोज एका राणी बरोबर जेवण घेण्याची संवय ते आवर्जुन पाळतात.छे!असं एकट्याने भोजन करण्याने नैराश्य येते,शिवाय आरोग्या च्या दृष्टीनेही अयोग्य आहे.ती म्हणाली, सकाळचा नास्ता कक्षात व दुपारचे जेवन सर्वांबरोबर घेतले तर…दुसर्‍या दिवशी सत्यनारायण पुजे च्या निमित्याने राजकुटुंबातील सर्वांना जोडीने नमस्कार करत,दशरथ राजांचे चरणस्पर्श करीत हळुवार शब्दात म्हणाली,आपण सर्वांनी एकत्र राहू व एकत्रच भोजन करुं असा आशिर्वाद मला द्यावा.त्यांनी तिच्या मस्तकावर हात ठेवत तथास्तु म्हटले आणि उर्मिलाने लगेच अमलांतही आणले.सर्वांना भोजन कक्षात पाहून ती सुखावली.नंतर हसी मजाकही होऊं लागली.वातावरण मोकळं झालं होतं.हळू आवाजात कैकयी तिला म्हणाली,जे मला २५ वर्षात साधलं नाही,ते तूं करुन दाखवलस.सर्व कुटुंब एकत्रीत भोजन करताहेत हे किती नयन रम्य वाटते ना?त्या दिवसांची आठवण उर्मिलेला आतां नकोशी वाटत होती.तरीसुध्दा पहिल्यासारखं वातावरण करायला हवय दुसर्‍या दिवशी उर्मिलाने सर्वांना भोजन कक्षात निमंत्रित केलं.कशासाठी बोलावलं हे कोणालाच कळेना.सर्वां समोर थंडगार सरबताचे चषक ठेवत उर्मिला म्हणाली,पूर्वीप्रमाणेच यापुढे आपण सर्वमिळून भोजन करणार आहो हे सांगण्यासाठी बोलावले आहे.गेले दिवस परत येणार आहे कां?संतापून कौसल्या म्हणाली,यासाठी बोलावले का चित्रकुट पर्वतावर उर्मिलाने उघडपणे केलेला विरोधाबद्दल कौसल्याने अजूनही तिला क्षमा केली नव्हती.त्यादिवसांपासुन तिच्या वागण्यांत आपुलकीचा अभाव आला होता.

आतां माघार घेऊन चालणार नव्हतं.उर्मिला म्हणाली,आपण आयुष्य भर खंत,शोक करत रहायचं कां? राम परत येतील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी तुमच्यात शक्ती हवी ना?माता कैकयी परत भोजनव्यवस्था हाती घ्यावी.सुमित्रा ने ही दुजोरा दिला.मांडवी,कीर्तीनेही संभाषणात भाग घेतल्याने उर्मिला सुखावली.एकमेकांच्या फिरक्या घेत हसत खेळत पुन्हा सर्वांनी एकत्र भोजन घेणे सुरु झाले.पण मांडवी मात्र अजूनही मोकळी झाली नव्हती.नंदीग्रामात जाऊन भरताला वर्षाहून अधिक काळ लोटला होता.उर्मिलाने आटोकाट प्रयत्न करुनही मांडवी कैकयीला क्षमा करायला तयार नव्हती.वियोगाचे खापर ती कैकयीच्या माथी मारत होती.संतापून मांडवीने विचारले,उर्मि, तू कैकयीमातेला क्षमा कशी करु शकतेस? तिच्याचमुळे तुला लक्ष्मणाचा विरह सहन करावा लागत आहे.हो!पण त्याचा तिला पुरेपुर दंड मिळाला आहे.प्रत्यक्ष स्वतः च्या पुत्राने नाकारणे,सर्वांचा तिरस्कार, स्वगृही बहिष्काराचं जीवन जगणे याहून मोठी शिक्षा कोणती असूं शकेल? मांडवी,तुला खरं सांगू का!इतकी संवेदनशील,राजकारणपटु,अतिशय हुशार,शस्रास्र निपून आणि विशेष म्हणजे भरतापेक्षाही रामावर अधिक प्रेम करणारी स्री अचानक अशी निर्दयी कशी होऊ शकते?मला यांत कांहीतरी गुढ वाटते.कसचं काय,ढोंग आहे सगळं मांडवी म्हणाली,तिने सर्वांना ज्याप्रकारे दुखवलं,तसचं तिला दुखवायचा मानस भरताचा होता,पण झाले उलटेच!शिक्षा मला भोगावी लागत आहे.कां अस?चुक तिने केली,निर्णय भरतांनी घेतला आणि शिक्षा मात्र मला भोगावी लागत आहे. वाऽऽ काय न्याय आहे…

उर्मि,तुला राजस्नुषा म्हणून कौंटुबिक व सामाजिक बंधनात जखडून टाकले.स्वतःच्या मुक्ती आणि आनंदा पासून दूर केले गेल याची चीड नाही येत तुला?येते ना!पण मांडवी मी सर्व सहन करते याचा अर्थ मी निष्र्कीय आहे असं नाही.मला जे बोलायचे,करायचे ते मी करतेच.प्रत्येकाला त्यांच्या वागण्याची जाणीव करुन देते.मांडवी,अग आपण स्री आहोत,पत्नी आहोत,सुना आहोत, सामाजिक बंधने पाळावीच लागतात आणि मांडवी चवताळून उठली.तीच्या मनातील क्षोम बाहेर पडल्यावर ती जरा शांत झाली.उर्मि,तूं इथे माझ्यासोबत आहेस हे केवढे माझे भाग्य!तूं एक जोडणारा सांधा आहेस.नाते बांधून ठेवणारे चैतन्य आहेस.तूं नसतीस तर माझे काय झाले असते? मांडवी उद्या रामांचा जन्मदिवस आहे.त्यासाठी तूं कांही सजावट करावी. अगऽ अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा असतो.दुसर्‍या दिवशी उत्सवाची तयारी करतांना उर्मिला थकून गेली आणि ह्रदयातील वेदना?अरण्यांत त्यांना आठवण तरी येईल कां?त्यांना जाऊन वर्ष लोटलं होत.त्यांच्यामागे तिला जायचे होते पण…ती थांबली प्रतिक्षेत… येईपर्यंत येण्याची वाट बघत… किती दिवसांनी राजप्रासादात आनंद दिसत होता.उर्मिलाचा उद्देश सफल झाला.रामाचा जन्मदिवस थाटा माटात संपन्न झाला.पण इतके सहजही झाले नाही.स्वतःच्या पुत्राच्या वाढदिवसा साठी कौसल्याला आधी तयार करावं लागलं.मग मात्र उत्साहाने भाग घेऊ लागली.पण कैकयीला पाहून मात्र थोडी असंतुष्ट झाली.तिचा अपमान होईलसे वागु लागली.कोणत्याही निमित्याने तिथून कैकयीला घेऊन जावं असही उर्मिलाला वाटले.त्याआधीच कौसल्या कडाडली,आज माझ्या पुत्राचा जन्मदिन आहे.ही कैकयी मला जवळपासही नको. खालच्या स्तरावर उतरणे शोभत नाही म्हणून,आजवर तिला सहन करत आले, तिच्या उपस्थितीत भोजनही घेतले, कारण माझ्यामुळे राजगृहाची शांती ढळू नये,परंतु आज तिचं अस्तित्व स्विकार ण्या इतका मोठेपणा नाही माझ्यात, उर्मिला!तुझी मुत्सद्देगिरी माझ्या लक्षात येत नाही असं वाटते कां तुला?शांतपणे उर्मिला म्हणाली, आज तुमच्या पुत्राचा जन्मदिन आहे,निदान आजतरी तुम्ही सर्वांना क्षमा करायला हवी,रामाचे आवडते पदार्थ करण्यात माता कैकयी गेले तीन दिवस पाकगृहात राबत आहे.कांही नाही सारा दांभिकपणा आणि इतक्या दिवसांची मनांत साठलेली मळमळ कौसल्याने बाहेर काढलीच. माझा पुत्र १४ वर्षांनी माझ्याजवळ येईल, त्याचं माझेवर प्रेम आहे,पण हिचा पुत्र मात्र कधीच येणार नाही.तिरस्कार करतो हिचा.हाच माझा सूड,हीच शिक्षा आणि हाच न्याय! माते याची पाळेमुळे खूप खोल वर रुजलेली आहेत.तुम्हा दोघींच्या एकमेकींच्या असूयेपोटी घडलय!तुम्हाला जशी राणी,राजपत्नी,राजमाता या पदां ना धक्का पोहचण्याची भीती वाटत होती तशीच कैकयीमातेलाही वाटत होती. आज पुत्राचा जन्मदिन असून तुम्ही आनंदी नाही कारण,कैकयीमातेबद्दल कडवट विचारांचे विष तुमच्या मनात साचलेलं आहे.कौसल्या क्रोधाने काळी निळी झाली.नजरेत संताप मावत नव्हता माझा एवढा अनादर करण्याचे धाडस झालच कस?आतां तूं सौमित्रिची पत्नी, या राजघराण्याची सून आहेस मिथिलाची राजकन्या नाहीस.अत्यंत सौम्यपणे उर्मिला म्हणाली,मी देखील सोसते आहेच ना? मी स्वतःसाठी कांही मागत नाही किंवा कांही करतही नाही.या प्रासादात परत शांती यावी,यासाठीच एवढा खटाटोप करते.जाणारे तर गेले, मात्र तुम्हा दोघीतलं वैमनस्य अजूनही तसच आहे.तुमच्या या असूया आणि सत्ता संघर्षाच्या खेळात बळी मात्र तुमचे पुत्र व त्यांच्याबरोबर आम्ही सुना पडलो. तुमच्या मुढ कृत्याचं मुल्य ते चुकवित आहेत.माते,राम जेव्हा परत येतील,हे चारही बंधू एकत्रीत येईल त्यावेळी त्यांच्या नव्या सुखात हे विष कालवाल कां?आणि उर्मिला निघून गेली.कौसल्या आपल्या सद् सद् विवेक बुध्दीला टोचणी देणार्‍या आठवणी घेऊन एकटीच निश्चल उभी राहिली… उदासवाणे वातावरण संपूर्ण नष्ट झाले नसले तरी,रामजन्मोत्सवमुळे वातावरण थोडं हलकफुलकं झालं. अशातच केकय नगरीहून प्रदीर्घ आजारा नंतर अश्वपतींचं निधन झाल्याची दुःखद वार्ता घेऊन दूत आला.कैकयी मांडवीसह केकयनगरीकडे रवाना झाली.भरताकडे नंदीग्रामकडे दूत पाठवला. शत्रृघ्ननने सोबत यायची तयारी दाखवली,पण निर्धाराने नकार दिला,इथे जास्त गरज आहे म्हणाली.कौसल्या तिच्याशी अतिशय मार्दवाने वागली.तिच्या प्रवासा ची पूर्ण तयारी करुन दिली. कैकयी जाऊन जेमतेम एक दिवस लोटला नाही तोच केकयनगरीहून दूत लखोटा घेऊन आला.हा साधा निरोप नव्हता तर,मृत्युपूर्व कैकयीला पाठवलेला राजमुद्रांकित निरोप आहे.काय करावे उर्मिलाला सुचेना!तिची द्विधावस्था बघून कीर्ती म्हणाली,कांही तरी महत्वाच असेल.कैकयी माता निदान एक मास तरी परतणार नाही.कांही फार महत्वाचा निरोप असेल तर?उर्मिलाने शासंक मनाने लखोटा उघडला.त्यावरुन नजर फिरवताच उर्मिलाच्या चेहर्‍याचा रंग उडाला.उर्मि,काय झाल?असं काय आहे पत्रात?उर्मिलाने पत्र कीर्तीच्या हाती दिलंं अरेऽ देवाऽ असं कसं होऊ शकते?माता कैकयीने आपणा सर्वापासून जे लपवून ठेवले ते या पत्रामुळे समजूं शकले. वाचलेल्या मजकुरावर उर्मिलाचा अजून ही विश्वास बसत नव्हता.कीर्ती म्हणाली, कुटुंबातील सर्व सदस्यांना लगेच सांगाय ला हवं.हे सत्य लपवू नये.पत्र पुन्हा उर्मिलाने शांतपणे अक्षर न् अक्षर वाचलं. कपाळावर आठ्या पडल्या.स्वःशीच म्हणाली,अशक्य!माझ्यामते हे पत्र प्रत्येकाला,विशेषतः भरताला,त्याही आधी शत्रृघ्नला दाखवू!इतर मातांना देखील,पण माता कैकयी आल्यावर!हे पत्र उघडण्याचा मी अपराध केला,त्या मुळे मलाच पुढाकार घेऊन बोलायला हवय! एक मासानंतर माता कैकयी परतली.तीच्याशी संवाद कसा सुरु करावा या उहापोहात उर्मिला होती. कैकयी अतिशय अपवादात्मक स्री असल्याचे उर्मिलाच्या लक्षात आले.सात भावांच्या पाठीवर झालेली कैकयी अश्वपतींची अतिशय लाडकी होती.तीचे विशेष संंगोपन केल होतं.ती पंडिता होती संगीत आणि इतर कलांमधे तिला विशेष गती होती.युध्दशास्रात निपून होती. अयोध्या नरेशांनी तिचा हात मागीतला व ती ही प्रेमात पडली म्हणून नाइलाजाने वयस्कर राजाशी तिचा विवाह करुन द्यावा लागला,पण तिच्या प्रथम पुत्राला अयोध्येचं राज्य देण्याच्या अटीवर!पुढे चार पुत्रांच्या जन्मानंतर सारच बदललं. ज्या रामावर कैकयीने भरतापेक्षाही जास्त माया केली,त्याच रामाविरुध्द ती अचानक कां गेली याचे उत्तर या एका पत्राने मिळाले.आणि उर्मिलेला वाटत असलेली शंका खरी झाली.

मनांत धाकधूक बाळगून,पण निश्चयाने उर्मिलाने राणी कैकयीच्या कक्षा त प्रवेश केला.तिला आलेले बघून आश्चर्याने तिचे हसत स्वागत केले.उर्मिला ने ते पत्र देताच तीव्रपणे कठोर स्वरात कैकयी म्हणाली,पत्र उघडण्याचे धाडस कोणी केले?मीच केले.म्हणूनच ते पत्र योग्य ठीकाणी द्यायला आले.मी ते पत्र वाचलं,तसेच शत्रृघ्न व कीर्तीनेही!आणि कौसल्या,सुर्मित्रा..नाही अजून.पण एक दिवस त्यांनाही समजेलच!त्यानंतर भरत राम,लक्ष्मण,सीतेलाही!हे ऐकताच राणी गुडघ्यात डोकं खुपसून ढसाढसा रडू लागली.ते पराजयाचे आणि विषन्नतेचे अश्रू होते.माते एवढं कटुसत्य सर्वांपासून कां दडवलस?उर्मिलाने मार्दवाने विचारले रामाला वनवासात धाडण्यासाठी नाटक रचलं होतं हे कां नाही कोणालाच सांगीत ले?राणीचा हुंदक्याशिवाय दुसरा आवाज नव्हता तिथे.उर्मिला म्हणाली,रामाचा वनवास विधिलिखित आहे हे माहित असून,स्वपुत्राच्या प्रेमाचं भरतं आल्याचं नाटक,कुटुंबियांचा रोष,पुत्रप्रेमाला पारख्या होऊन कां त्यांचा तिरस्कार ओढवून घेतला?कां असं केल?तुम्ही आणि तुमच्या पित्यांनी कां मौन धारण केल?उर्मिला ते तसच होणार होत.ती एक प्रदीर्घ कहाणी आहे.उसासा सोडत राणी बोलूं लागली…ज्यादिवशी राजाशी विवाह झाला,त्याच्या दुसर्‍याच दिवशी माझं भविष्य मला कळले होते.केकय राजगुरु ऋषी रत्नांनी सांगीतले,पुत्रविरहा ने माझ्या पतीचे प्राण जातील.त्यांच्या मृत्युनंतर सिंहासन रिक्त रहायला हवय, अन्यथा त्यावर जो कोणी बसेल त्याचा मृत्यु होईल.त्यांच्या भविष्यावर माझा तेवढा विश्वास बसला नव्हता.पण एके दिवशी राजाने त्यांना मिळालेल्या शापा बद्दल उल्लेख केला त्याच क्षणी मी सावध झाले.कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी होती. म्हणूनच या कालावधीत राजसिंहासना वर कोणी बसणार नाही ही दक्षता घेऊन हे सारं घडवून आणले.राजगुरु वसिष्ठ हे सारं जाणत होते.रामाच्या पादूका सिंहास नावर ठेवण्याची कल्पना त्यांनीच सुचवली होती. हे सर्व ऐकून उर्मिला आवाक् होत म्हणाली,वसिष्ठगुरुंनी आम्हा सर्वांना अंधारात ठेवले?तुम्ही हे सर्व जाणत असून उघड्या डोळ्यांनी पतीचा मृत्यु पाहत राहिल्या?होय!ज्याचेवर निरतिशय प्रेम केलं,त्यांचा संथ,व्याकुळ अवस्थेत कणाकणाने होत असलेला मृत्यु बघावा लागला.कारण त्यांना तसा शापच होता.

हादरुन उर्मिला म्हणाली,त्यांना शेवटच्याक्षणी तरी सांगीतले असते तर, त्यांचा मृत्यु सुखकर झाला असता ना? त्यांनी माझेवर त्यावेळी विश्वास तरी ठेवला असतां का?मला मिळालेले दोन वर त्यांच्या गळी उतरवतांना मला फार कष्ट पडले.इतकी निष्ठूर मी होऊ शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अपशब्द बोलून त्यांचा समज दृढ करण्या साठी मला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.आमच्या प्रेमाचाच नाही तर त्यांचा व आमच्या भविष्याचा त्याग करावा लागला.रामाचा जीव वाचवणे महत्वाचे होते.मती कुंठीत झालेल्या उर्मिलाने विचारले,भरताला युवराज अभिषेकाची मागणी करुन त्यांचा जीव धोक्यात नव्हता कां?

नाही! मला पूर्ण खात्री होती, भरत कधीच राजसिंहासनावर बसणार नाही.उर्मिलाच्या मनात राणीबद्दल पराकोटीचा आदर निर्माण झाला.कुटुंबा च्या रक्षणार्थ तिने स्वतःवर तिरस्कार, कलंक ओढवून घेतला.उर्मिलाने विचारले समजा असं घडल नसतं तर?नाही, माझ्या पित्याची मागणीच तशी होती. त्यांना पक्षी,प्राणी,किटकांची भाषा समजण्याची शक्ती होती.ही गोष्ट कुणाला सांगीतली तर त्यांचा मृत्यु अटळ होता. माझ्या मातेला त्याचमुळे राजप्रासादातून नगरातून बहिष्कृत करावे लागले होते. माझे तात बराचसा काळ अरण्यात घालवित असत.तिथल्या पक्षांच्या संभाष नावरुन कळवे की,यज्ञकर्म करणार्‍या ऋषींच्या यज्ञात रावण विध्वंश आणून त्यांना ठार करतो,या रावणाला फक्त राम च मृत्यु देऊ शकतो हे त्यांना समजले होते.म्हणजे वनवासाच्या काळात रामा कडून रावणाचा मृत्यु होईल? त्याआधी तुमच्या पिताश्रींनी तुम्हा ला कांहीच सांगीतले नव्हते कां? नाही.. कारण ज्याक्षणी त्यांनी मला हे सांगीतले असते त्याचक्षणी त्यांचा मृत्यु घडला असतां,मला फक्त एवढचं सांगीतल की, कांहीतरी योजना करुन रामाला राज प्रासाद व नगरातून बहिष्कृत करावं. पित्याच्या आज्ञेचं मी पालन केलं.मला वाटले भरताच्या प्रेमापोटी,त्याला राज्य मिळावं म्हणून हे करवत असतील,मी अशी शंका व्यक्त केल्यावर,त्यांनी ठाम पणे नकार देऊन मला हे कृत्य करायला भाग पाडले.स्वमृत्युच्या भयामुळे ते सांगू शकत नव्हते.पण त्यांच्या सांगण्यानुसार ही योजना पार पडल्यावर,कुटुंब,प्रजा, विशेष म्हणजे भरताच्या रोषाला बळी पडलेली बघून स्वतःच्या मृत्युची पर्वा न करतां मोठ्या धैर्यान या पत्रात लिहून कळविलं आणि मृत्यु कवटाळला. कैकयी अचानकच वयस्कर दिसूं लागली.उर्मिलेने गलबलून विचारले, माते!तुम्ही पती,पिता गमावून पुत्राच्याही मनातून उतरलात,त्यापेक्षा राजाना सांगीतले असते तर?राजाने कधीच मान्य केले नसते.दंडकारण्यातील असुर,दैत्यां चा नाश करण्यास रामाला कधीच पाठवलं नसतं.मागेच ताटकावधाच्या वेळी विश्वामित्रांसोबत पाठवायची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती.ऋषीच्या कोपाची भीती व वसिष्ठांनी समजवल्यावर पाठवले होते.ऋषी रत्न व पित्याचे भाकीत मिळती जुळती आहेत हे लक्षात आल्यावर रामाचा वनवास अटळ आहे मी फक्त माध्यम होते इतकेच! हे दुर्देवी खापर तुमच्यावर फोडले जात असल्यावर कुटुंबाल कां सत्य सांगत नाही? कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.तूं चुकुन पत्र वाचले म्हणून तूं विश्वास ठेवलास.मी कोणाकोणाची माझ्या सद्हेतूबद्दल समजूत घालणार?मी निमित्य ठरावी अशीच नियती होती. आतां फक्त एकच करायचय,हे रहस्य कुणालाही कळणार नाही याची काटेकोर पणे दक्षता घ्यायचीय!मंथराला हे सारं माहित होत? छे! ती त्या दोन वरांची आठवण देऊन भावनेचं भांडवल करुं लागली व मी ही प्रतिसाद दिला.त्यामुळे तिने स्वतःबद्दल गोड गैरसमज करुन घेतला.ते कांहीही असलं तरी,मी तिच्या दुधावर पोसल्या गेले,माझे तिने व्यवस्थि त संगोपन केले,माझं सदैव हितच पाहिलं,ती माझ्या मातेच्या जागी होती हे मी अमान्य करणार नाही.माझ्या पित्याने तिला केवळ माझी पाठराखण म्हणून पाठवली नसावी,तर माझ्यात असलेल्या उणीवांची त्यांना जाण असल्यामुळे योग्य वेळी रामाला राज्यातून बहिष्कृत करायला तिची मदत व्हावी या हेतूने पाठवले असावे हे आज वाटते. आज कैकयीचा जीवनपट उर्मिला समोर उघड झाला होता.प्रेमात पडलेली सुंदरी,उत्साही मोहक नववधू,असुरक्षित भयभीत पत्नी,महत्वाकांक्षी आणि सामर्थ्यशाली राणी,न्याय्य आणि प्रेमळ माता,अवहेलना झेलणारी धैर्यवान, निःस्वार्थी स्रीचे अनंत उपकार या कुटुंबा वर आहेत.त्यातून कधीच ऋणमुक्त होता येणार नाही. उर्मिला,तूं समोर दिसली की,मला फार अपराध्यासारखे वाटते.तुझा आनंद तारुण्य सारं हिरावून घेतलं.शक्य असेल तर माफ कर!माते,क्षमा तर मी मागायला हवी,मी अनादराने बोलले,प्रसंगी संभावना केली..म्हणूनच कोणाला कांही न समजलेलं बरे!मला या तिरस्कारा सोबत जगुं दे.लहानपणी दुर्वास ऋषीच्या तोंडाला काजळी फासली होती,तेव्हा त्यांनी संतप्त होऊन शाप दिला होता, जगात माझं तोंड काळ होईल.ती शाप वाणी आतां कैक वर्षांनी खरी ठरली. उर्मिला,हेच माझे प्राक्तन,दैव्य आहे.माते, यावर कांही पर्याय नाही कां?उर्मिला मी ही तुझ्यासारखीच मुक्त व निर्भिड होते. नियतीवर,ऋषी रत्नावर,माझ्या पित्यावर विश्वास नव्हता.शापाच्या सतत दडपणांत जगणार्‍या दशरथ राजांची हेटाळणी करीत होते,पण तो शाप,भाकित सारं खरं ठरलं.जे घडायच ते घडतच!असे म्हणून हातातील पत्राला दिव्याची ज्योत दाखवली.पत्राने लगेच पेट घेतला.राख तिच्या पायाशी विखुरली,अगदी तिच्या आयुष्यासारखी…. लक्ष्मणाच्या आठवणीत उर्मिलाचे दहा वर्षे सरली.आज ती २७ वर्षाची झाली.ते परतायला अजून चार वर्षाचा कालावधी उरला होता.त्यावेळी ते ३७ वर्षाचे असणार होते.कोवळ्या युवतीचे रुपांतर प्रगल्भ तरुणीत झाले.पण विवाह होऊन या कुटुंबात आली तेव्हाच तिचे स्रीमधे परिवर्तन झाले होते.गेल्या दहा वर्षातील प्रदीर्घ आठवणीत मग्न असतानांच,खाली बागेत शांताचे मूल खेळतांना बघून,विचार आला,आज आपल्याला मुलबाळ असतं तर,आपला वेळ त्याच्यासोबत खेळण्यात गेला असतां,त्याचवेळी तिला बहिणींची आठवण झाली.प्रत्येकीच्या पतीने संन्यस्त जीवन स्विकारल्यामुळे,प्रणय त्यांचेपासून दूर होता.दुःख,वेदना न मानतां,रामाप्रमाणे ब्रम्हचर्य पालन करुन सर्वजण नैतिक शुध्दता आणि कणखरते ने वागत होते.पण मांडवीचे विचार वेगळे होते.तिला वाटत होते,या कुटुंबरुपी कारा गृहात बंदिस्त आहो.

त्यामानाने कीर्ती मात्र समाधानी होती.शत्रृघ्नच्या सहवासात आणि तिच्या विनोदी स्वभावाने दोघेहि आनंदात राहत होते.चौघींचाही विवाह एकाच दिवशी झाला,पण जीवनाचा स्विकार करण्याची पध्दत प्रत्येकीची वेगळी होती.मांडवी कडवट,कीर्ती ज्ञानी आणि स्वतः एखाद्या उत्पेरकासारखी!घटना घडत होत्या.काळ पुढे धावत होता.कैकयीचे खरं स्वरुप उर्मिलाने कुटुंबासमोर उघड केल्यामुळे तिन्ही राण्या गुणागोविंदाने,मनात द्वेष, आकस,तिरस्कार न ठेवता वागत होत्या. संपूर्ण दशक अश्याच पध्दतीने सरळ होते. “ब्रम्हयज्ञ” या गौरवशाली तत्वज्ञान विषयक परिषदेसाठी जनक राजाचे निमंंत्रण आले.ही सभा दरवर्षीच भरत असे.पण या वर्षी उर्मिलाला पुत्री या नात्याने न बोलावतां “पंडिता” म्हणून विशेष पाचारण केले होते.तिला आश्चर्य वाटले.गेली कित्येक वर्ष ती वसिष्ठ व राजसभेतील वामदेव,मार्कंडेय आणि कात्यायनांकडे अध्ययन करीत होती. सुरुवातीची शिष्या झालेल्या उर्मिलाने विदुषिपर्यंतचा पल्ला गाठला होता.हा प्रवास करतांना धर्म आणि तत्वज्ञान या विषयांवर ज्ञानी मुनींबरोबर चर्चा करीत असे.त्या महत्वाच्या परिषदेला शिरध्वज जनकांनी तिला निमंत्रीत केले होते. या परिषदेला साध्वी गार्गी आणि विवादस्पद गुरु जबालीही उपस्थित राहणार असल्या मुळे चर्चेला रंग चढणार होता. कीर्तीला सांगीतल्यावर,ती म्हणाली,आमच्या तिघींपेक्षा तूं नेहमीच दुर्लक्षित राहिलीस.सीता जेष्ठ गुणी,दत्तक म्हणून,तर आम्ही दोघी माताविहिन म्हणून मातापित्यांनी आमच्यावर जरा जास्तच माया केली.पण तरीही तूं कधीच आमचा हेवा केला नाही.असूया,आकस, राग या भावनांना जवळ फिरकुही दिले नाही.तुझी प्रगल्भता आणि मनाची व्यापकता यातच सारं समावलं आहे. तुझी क्षमता ओळखून वेड्यासारखं प्रेम करणारी एकच व्यक्ती आहे..लक्ष्मण! आतांपर्यतच्या परिसभेपेक्षा या वर्षीच्या परिसभेचा उर्मिलाला नवा अर्थ कळला.देशभरांतील अनेक ऋषी,विद्वान बुध्दीवंत उपस्थित होते.विविध विषयांवर चर्चा,वादविवाद,खल अशा अनेक माध्यमातून ज्ञानाची विसृत देवाण घेवाण होत होती.सत्याचा वेध,मानवी मनाचा थांग गाठण्याचा आणि ज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न होत होता आणि या सर्वा ला उर्मिलाचा सहभाग होता. त्यादिवशी परिषदेत उर्मिला पंडिता म्हणून,तत्वज्ञ गुरु गार्गी,ऋषी अष्टवक्र आणि अयोध्येतून आलेले गुरु वसिष्ठ,गुरु मार्कंडेय,आणि याश्रवल्क्यां सोबत उर्मिला बसली होती.याज्ञवल्क्यां नी त्यांच्या प्रत्यक्ष गुरुंनाच आव्हान केल्यामुळे,उर्मिलाच्या मनातील खोटा अभिमान,शुल्लक भावना गळून पडल्या ने तिला शांत वाटू लागले.ती उर्मिला होती.उत्कट स्री एवढाच अर्थ तिच्या नावाला नव्हता तर,बौध्दीक,अध्यात्मिक प्रगतीत तिचं मन,बुध्दी एकवटली होती. कन्या,पत्नी आणि सुनेच्या मर्यादेत राहत स्वतःचे व्यक्तीमत्व खुलवले होते.अशा प्रसंगी लक्ष्मणाची उणीव तिला प्रकर्षाने जाणवली.त्यांनी तिचं कौतुक केलं असतं आणि तिनं मिळवलेलं यश अभिमानाने मिरवलं असत. त्यादिवशी उर्मिला पित्याचे चरण स्पर्श करीत असतां,राजा जनक म्हणाले, याच दिवसाचं स्वप्न मी गेल्या कित्येक वर्षापासून पाहत होतो.याचकरितां एवढे वर्षे जीवित राहिलो.तिचं पित्याशी वेगळं च नातं होतं.सामान्य नात्याहून अनोख! म्हणजे मी एक दिवस पंडिता होईल असे तुम्हाला वाटत होते?होय पुत्री,तू प्रेमळ होतीस,कल्पना आणि भावनांची निःसंदिग्धताचा वापर कसा करावा याचे तारतम्य तुला अगदी लहानपणापासून होते.तूं मोठी होत गेली तसे पैलू पडत गेले.अयोध्येतील राजगुरुंच्या ज्ञानाचा लाभ घेण्याची मिळालेल्या संधीचा तूं उपयोग केलास,त्यामुळेच आज तूं या पदाला पोहचूं शकली याचा मला कौतुक अभिमान आहे.सहज घडत गेलं.तसही गेल्या वर्षांमधे अध्ययन व चित्रकले शिवाय दुसरं काय होतं आयुष्यात? तर मग याच श्रेय लक्ष्मणाला द्यायला हव,ते वनात गेले नसते तर,तुला हे ज्ञान संपादन करतां आले नसते.तुझ्या तील वेगळेपणा बघूनच ते तुझ्या प्रेमात पडले.अग्नीची ओळख अग्निलाच पटू शकते.तुला विचारांच आणि कृतीचं स्वातंत्र्य देत लहानाचं मोठं केलं.विरहातू न च तुम्ही एकमेकांचे विचार जाणून घेत आहात.एक लक्षात ठेव उर्मि,राम आणि लक्ष्मण एकमेकांचे प्रतिबिंंब आहेत.एक आत्मा दोन शरीरात वसला आहे.मला आनंद आहे.लक्ष्मण वनात गेल्यावर सुरुवातीला उमटलेली उद्वेगाची भावना जाऊन,एक दुराग्रही मुलगी ते सुज्ञ स्री हा प्रवास करुं शकली.जनक पुढे म्हणाले, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीपासून अलिप्त राहतो तेव्हाच भावनावैरविध्या च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचं मुल्य जाणवतं. गेल्या वर्षांनी तुला हेच शिकविले.तूं तपस्वीनी झालीस.उच्च आध्यात्मिक शिक्षण प्राप्त करुन बौध्दीक स्तरावर विलक्षण यशप्राप्ती केलीस.एक पंडिता म्हणून आज तुझ्या समोर मी नतमस्तक होतो.तूं वेदातील ऋचा म्हटल्याने किंवा वेदाध्यायन केल्याने तुझ्यातील विद्वत्ता झळकली नाही तर,तूं सहन केलेली वेदना,वियोग आणि स्विकारलली अलिप्ततेचा हा परिपाक आहे.तुझा विरह हिच तुझी ध्यानधारणा व तुझा आध्यात्मिक पुनर्जन्म असून पतीवरच्या प्रेमामुळेच सर्वांत राहूनही मुक्त होऊं शकलीस. तात,मग मांडवीचही आयुष्य माझ्यासारखच…उर्मिला वैयक्तिक क्षमता आणि आकलन शक्तिला अनुसरु न प्रत्येकाला आपलं आयुष्य जगावं लागतं.मांडवीत दुखावल्या गेल्याची भावना आणि संताप इतका तिव्र आहे की,ती त्यातच जळत असल्यामुळे तिला शांती,सुज्ञता,मोक्ष कसा मिळणार?नियती आपल्या वाट्याला आल्यावर तिचा स्विकार कसा करावा हे आपल्या वर अवलंबून असते.पित्याशी सविस्तर चर्चा झाल्याने, सत्य तिच्यासमोर आलं . दुसर्‍या दिवशी आपल्या स्वगृही अयोध्ये कडे प्रयान केले. राम,लक्ष्मण,सीतेला परतायला थोडाच अवधी उरला होता.उर्मिलेच्या मनी आशेचे अंकूर फुटले होते.राम येण्या आधी नव्याने राजसभा बांधली होती. त्याचेच ती निरिक्षण करीत असतां,भरत येत असतांना बघून तिला आश्चर्य वाटले व चिंतीतही झाली.गेल्या १३ वर्षात त्यांनी प्रासादात पाऊल ठेवले नव्हते. रामाबरोबरच परत येईम असा दृढनिश्चय भरतांनी केला होता.असे असतां,नंदी ग्रामवरुन भरत आले म्हणजे,नक्कीच कांहीतरी विशेष घडले असावे.कैकयी माते विषयी त्यांना माहित झाले की नाही सांगता येत नाही.भरत कौसल्येच्या महालात पोहोचले तेव्हा तिथे दोन्ही माता होत्या.त्यांच्याकडे पाहतांच कांहीतरी भयंकर घडल्याची जाणीव उर्मिलेला झाली.शत्रृघ्न,कीर्ती,मांडवीही आल्या होत्या.अधिरतेने उर्मिलाने विचारले, भरता काय झाले? भरत म्हणाले,दूतांनी आणलेल्या वार्तेनुसार पंचवटी कुटीतून सीतेचे अपहरण झाले.राम,लक्ष्मण कुटीत नाही हे बघून,ब्राम्हणाच्या वेषात रावणाने येऊन भिक्षा वाढणार्‍या सीतेला खांद्या वर टाकून पुष्पक विमानाद्वारे पळवून नेत असतां,गिधाडराज जटायूने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तो स्वतः जखमी झाल्यावर,राम लक्ष्मण आल्यावर सीता ला कोणत्या दिशेने नेले हे सांगून प्राण सोडले.सध्या सीता रावणाच्या अशोक वाटिकेत आहे.राम लक्ष्मण हे सुग्रीव, हनुमान व वानरसेनेच्या मदतीने लंकेवर चालून जात आहे.कधी घडलं हे? ग्रिष्मात. वार्ता मात्र आतां आली.सीतेवर रात्रदिवस राम लक्ष्मणाचा पहारा असतांना,दिवसा ढवळ्या तिचं अपहरण कसं होऊ शकल? हा एक कुटील कारस्थानाचा भाग होता.रावणाचा मातुल मारीचने कांचन मृगाचे रुप घेतलं.सीतेच्या हट्टापायी लक्ष्मणाला सीतेकडे लक्ष द्यायला सांगून राम त्या कांचनमृगाच्या मागे गेले.बरेच अंतर गेल्यावर रामाने आपल्या बाणाने त्याला टिपल्यावर मरतांना त्याने लक्ष्मण सीता धावऽऽ असा टाहो सीतेने ऐकल्या बरोबर रामाच्या मदतीस जाण्यास सांगीतले.ते ऐकत नाहीसे बघून त्यांंना अपशब्द बोलून जाण्यास भाग पाडले. हीच संधी रावणाने साधली.कौसल्या म्हणाली,पण लक्ष्मणाने रामाची अवज्ञा केलीच कशी?तेव्हा भरत म्हणाले,माते, सीतेचे रक्षण करतांना त्याने प्राणत्याग केला असतां,पण तो रामाची अवज्ञा कधीच करुं शकत नाही.खरं कारण कळे पर्यंत दोषारोपण करणे योग्य नाही.

मांडवीने मधेच विचारले,रावण लंकानरेश,मग त्याने लंका सोडून पंवटीत कशाला आला?भरत म्हणाले, रामांनी कसं राक्षसांचे निर्दालन केले,ऋषीमुनींना कसं संरक्षण दिलं,शुर्पणखेचे नाक कापल्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यास तिने रावणाला कसं उद्युक्त केले, खर,दुषण सशस्र राक्षस सैन्यासह राम लक्ष्मणावर चालून आल्यावर कसा त्यांचा निःपात केला हे सर्व कथन करुन भरत म्हणाले,चाणाक्ष रावणाने,राम लक्ष्मणाला गुडघे टेकायला लावणे हे सीतेच्या माध्यमातूनच होऊ शकते हे जाणून मारीच राक्षसाच्या सहाय्याने योजना आखली.मारीच रामाचा पराक्रम जाणून असल्यामुळे त्याने रावणाचा बराच विरोध केला,पण सत्तेपुढे शहाण पण चालत नाही त्याप्रणे त्याला रावणा पुढे मान झुकवावी लागली.पण या सार्‍या सांगण्याचा कांहीच परिणाम उर्मिलावर झाला नाही.ती संतापाने म्हणाली,जेष्ठांनी सीतेला जाण्यापासून कां अटकाव केला नाही.त्यावर सुमित्रा शांतपणे समजावत म्हणाली,सीतेने ऐकले नसते.रामाने कमी कां प्रयत्न केले मी तिच्याबरोबर असते तर हे घडलेच नसते.नाही उर्मिला!हा व्यूह अतिशय विचारपूर्वक रचला होता.अन्यथा विचारी अत्यंत वास्तववादी राम चंदेरी ठीपक्यां चा कांचनमृग जो अस्तित्वाच नाही त्याच्या मागे धावला असता? आतांपर्यंत मौन असलेल्या कैकयीकडे वळून उर्मिला म्हणाली,माता, तुम्ही तर सारं जाणता,मग सीताहरण त्या भाकिताचा भाग होता का?अंतहीन अशा दुःखात सीता कां ओढल्या गेली? उर्मिला,सीता वनवासात गेली,यामागे नक्कीच कांही संकेत असेल.राम जर रावणाचा वध करणार तर सीता हे निमित्य ठरणार असेल.तूं चिंता करुं नकोस.राम सुरक्षित सीता परत आणेल. उर्मिला अंतर्मुख झाली.स्वयंवरांती ल सूड रावणाने उगवला असेल का? शुर्पणखाची विटंबना आणि रामाचा सूड हे कारण असेल का?रावण सीतेला कसं वागवत असेल?हे अंतहीन दुःस्वप्न कधी सरणार?सौख्य वाटावा असा नवा दिवस कधी उजाडणार? चौदा वर्षे उर्मिलाने अतिशय विकल आणि नैराश्यात काढली.गेल्या कांही दिवसांपासून विविध वार्ता तिच्या पर्यत येत होत्या.पत्नी विरहात वेडापिसा झालेले राम,सीतेच्या शोधात रानोमाळ भटकत होते.एकाक्ष कबंधाच्या माध्यमा तून रामलक्ष्मण पंपा सरोवराकाठी पोहोचले.तिथे वास्तव्यास असलेल्या सुग्रीव व हनुमानाची भेट झाली.सुग्रीवा चा भाऊ वालीने,त्याचं राज्य व पत्नी बळकावली.सीतेला पुष्पक विमानातून नेतांना सीतेने खाली टाकलेले अलंकार रामाला दाखवतांच ओळख पटली.दोन समदुःखी एकत्र आल्याने त्यांच्यात मैत्री जुळली.सुग्रीवाला त्याची पत्नी व राज्य मिळवून देण्याचे रामाने वचन दिले व सुग्रीवाने संपूर्ण वानरसेनेसह लंकेवर आक्रमण करण्यास मदत देण्याचे कबुल केल.ठरल्याप्रमाणे सुग्रीव-वाली द्वंदयुध्दा त रामाणे वालीचा वध केला.सुग्रीवाला राज्य व पत्नी परत मिळाली.त्याने हनुमानाला सीता शोधार्थ पाठवले.सीता अशोकवाटीकेत आढळली.आणि हनुमान रामाचा दूत म्हणून तिच्यासमोर प्रगट झाल्यावर त्याच्या समवेत येण्याचे नाकारुन तिने रामासाठी निरोप दिला, स्वतः रामाने लंकेत येऊन तिला घेऊन जावे.नंतर हनुमानाने लंकादहन केले. हनुमानाने निरोप सांगीतल्यावर,देवांचा वास्तुविशारद विश्वकर्माचा पुत्र नल ने वानरांच्या सहाय्याने अफाट महासागरा वर सेतू बांधला. या सेतूवरुन राम लक्ष्मण वानरसेनेसह लंकेच्या किनार्‍या वर पोहचले.रामाने रावणाविरुध्द युध्द पुकारले.

उर्मिलाला आज पहाटे पडलेल्या दुःस्वप्नाने अत्यंत अस्वस्थ होती.काय घडले असावे?या विचारांत असतांनाच भरत तिच्या भेटीला आलेले बघून ती चकित झाली.परत कां आले भरत? भरताचे डोळे अश्रूंनी डबलेले होते चेहरा उतरला होता.दुःखद वार्ता उर्मिलाच्या कानावर घालण्यासाठी धीर एकवटून म्हणाले,रावणपुत्र इंद्रजितचा जिवघेणा बाण लक्ष्मणाच्या ह्रदयाजवळ घुसला असून तो बेशुध्द आहे.जगण्याची आशा फार कमी आहे.आणि भरत ढसाढसा रडू लागले.सकाळी पडलेलं ते दुःस्वप्न खरं होतं तर?तिच्या नजरेसमोर विवाहा पूर्वीपासूनचे आतापर्यंतचे सर्व दृष्य चलचित्राप्रमाणे साकार झाले.तिच्या मना ची अत्यंत दोलायमान अवस्था झाली होती.विश्वास ते विस्मरण,मरण्याची आशा ते जगण्याची इच्छा…नाही नाही.. असं होणं शक्य नाही.तिचा एकनिष्ठ पती प्रियकर नक्की परत येईल,नव्हे त्याला मृत्युवर विजय मिळवून यावच लागेल. एकदम सुमित्राचा विचार आला आणि तिच्याजवळ जाऊन म्हणाली,माता घाबरूं नका.राम असल्यावर त्यांचेवर ते संकट येऊच कसं देईल? ते शुध्दीवर येऊन परत युध्दाला उभे राहतील. लक्ष्मणाला कांहीही होणार नाही.ते योध्दा आहे.आपल्या बंधूबरोबर युध्द जिंकून सीतेसह परत येतील मला पूर्ण खात्री आहे. वरकरणी उर्मिला कितीही धीर दाखवत असली तरी,अंतरंगी ती भय व्याकुळ झाली होती.लक्ष्मण परत येईल या आशेवर गेल्या १४ वर्षातील क्षण न क्षण घालवला होता.लंकेच्या किनार्‍यावर युध्द सुरु होत.त्याचवेळी राजप्रसादातील भिंतीआड प्रत्येकाचं आपलं युध्द सुरुं होत.कांही परिस्थितीशी,देवाशी,ईश्वराशी तर कांही स्वतःशीच युध्द करत होते. प्रत्येकाचं शस्र वेगळं होत…तिरस्कार, रागाने उच्चारलेले शब्द,प्रेम,संयम आणि दृढ विश्वास…या आंतरिक युध्दात कोण जिंकेल?कोण काय गमावणार?गेलेल्या आणि जगलेल्या क्षणांचं मूल्य केवळ स्मृतीत दडलेलं होतं.

भरताला रामाच्या मदतीला जायला सांगीतल्यावर ते म्हणाले,त्याची कांही गरज नाही.तिथे रावणाचा दुखावलेला भाऊ बिभिषण,एकनिष्ठ हनुमान आहे. हनुमान मोठा पर्वत घेऊन अयोध्येवरुन उड्डाण करतांना,स्वतःचा परिचय देऊन म्हणाला,नेमकी कोणती संजीवनी वनस्पती आहे हे न कळल्यामुळं गंधमाद पर्वतच लक्ष्मणाच्या उपचारासाठी घेऊन जात आहे.वानरवैद्य सुशेष्ण यांनी सांगीतल्यानुसार ही वनस्पती सूर्योदया पूर्वी दिली की,लक्ष्मणाचा धोका टळेल. उर्मिलाला लक्ष्मण वाचण्याची पूर्ण खात्री झाली.आणि झालेही तसेच,लक्ष्मणासह जी वानरसेना बेशुध्द होते ते सर्व शुध्दी वर येऊन खडबडीत बरे झाले व युध्दास सज्ज झाले.लक्ष्मण जिंकेल याबद्दल कोणतीच शंका राहिली नाही. शत्रृघ्न म्हणाले,रावणापेक्षा इंद्रजित जास्त शूर आहे.पूर्वीचा मेघनाद असलेला त्याने इंद्रावर विजय मिळवला म्हणून त्याला इंद्रजित नांव मिळाले.इंद्रजितला एकच व्यक्ती मारुं शकते ज्याने प्रदीर्घ काळ ब्रम्हचर्य पालन केलं,ज्याच्या पत्नी ने त्याग केला,जिच्या प्रेमाचं अभेद्य कवच त्याला लाभलं,ती व्यक्ती म्हणजे माझा बंधू लक्ष्मण!पुढे म्हणाला,तुझ्या तपामुळे माझा बंधू वाचला.आम्हा सर्वां ना तूं वाचवलस.आम्ही जरी राज्याची, प्रजेची काळजी घेत असलो तरी,तूं आम्हा सर्वांची काळजी घेत आलीस. कुटुंबाला बांधून ठेवलस.तुझा संयम, चैतन्य आणि आशा हे वरदान या गृहाला मिळालं.ठामपणे उभं राहून स्वतःचे विचार मोकळेपणे मांडलेस,नियम तोडले नाही,पण वाकवले जरुर!तुझ्या दुःखा कडे आम्ही डोळेझाक केली,तरीही तूं आम्हाला सतत सावरत राहिलीस.वर्षोन वर्षे आम्ही एकमेकांप्रती शाशंकता बाळगून,सारं ठीक आहे असा आभास निर्माण करुन वागत होतो,पण तूं आम्हा ला सत्याचा स्विकार करायला शिकवले. खरा उमदेपणा आहे तुझ्यात.तुझ्यामुळे आम्हाला अभिमानाचा अर्थ उमगला. आम्ही सारे तुझे ऋणी आहोत.

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रामा ने रावणवध केला.सीता मुक्त झाली.रामा च्या शौर्यकथेने अयोध्यानगरी दुमदुमली. रामाच्या स्वागतासाठी नगरी सजू लागली आणि अचानक उर्मिलाच्या कानी विश्वास न बसणारी एक विचित्र वार्ता आली.प्रेम,कर्तव्य आणि निष्ठेच्या पावित्र्याला कलंक लावणारी वार्ता… आपलं पावित्र्य सिध्द करण्यासाठी सीता ला अग्निपरीक्षा द्यावी लागली,हे समजताच उर्मिला स्तंभित झाली.रामाने हे कां घडवले?समाजाच्या नजरेत निर्दौषत्व सिध्द करण्यासाठी,एवढे अग्नि दिव्य,मानहानी करण्याची सक्ती कसे करुं शकले राम?सीता स्वतः रावणाकडे गेली नव्हती.असं असतां,रामाच्या आणि लोकांच्या मनांत आशंका कां?अश्या पतीसाठी,जीने राजमहालातील सुखासीन जीवन घालवण्याऐवजी दीर्घ काळ वनवास पत्करला.

आणखी पांच दिवसांनी अमावस्ये ला त्यांच आगमन होणार आहे.त्यासाठी आतां वाद बाजूला ठेवून,मांडवी व कीर्ती ला उर्मिला म्हणाली,त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागणे उचित होईल.सर्वकांही पूर्वीसारखं होईल या विचाराने उर्मिला सुखावली

झालं त्यांचं आगमन.संपूर्ण नगरी व राजवाडा सुशोभित झाली.तिघांच्या स्वागतासाठी जेष्ठ राणी कौसल्या नदीग्रामला पोहचली.भरताबरोबर त्या तिघांना रथातून उतरतांना प्रथमदर्शन उर्मिलाला झाले.ज्या पायरीवरुन लक्ष्मणाला १४ वर्षापूर्वी निरोप दिला होता,त्याच पायरी वर पंचारतीचं सुवर्ण तबक घेऊन उर्मिला उभी होती.त्यांच्यावरुन नजर हटत नव्हती.इंद्रजितकडून झालेला विषारी बाणाचा व्रण लक्ष्मणच्या छातीवर ठळक पणे तिच्या नजरेत भरला.तिच्याजवळ जात लक्ष्मण म्हणाले,मिलाऽ तुझ्या तपः सामर्थ्याने आज मी तुझ्यासमोर जीवंत उभा आहे.माझ्या आयुष्याचा अर्थ तूंच आहेस.तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून म्हणाले,आतां दुःखद अंत झाला.या आनंदीक्षणी डोळ्यात अश्रू नकोत.शांता ही आपल्या भावांच्या स्वागतासाठी आली होती.सर्वांनी त्यांना औक्षण केले. पुढच्या कांही क्षणातच ते कुटुंबियांच्या प्रेमळ वर्षावात चिंब भिजले.राम कैकयी ला चरणस्पर्श करीत हळूच म्हणाले,माते मी जे साध्य करणे तुला अपेक्षीत होते,ते मी केलं आहे. कैकयी रामाच्या मस्तकावर हात ठेवत म्हणाली,नियती मोठी विचित्र आहे ती तिच्या इच्छेप्रमाणे कठपुतलीसारखं निचवते.तू फार मोठं कार्य पार पाडलेस. या देशाला एका मोठ्या संकटातून आणि महाबलाढ्य शत्रूच्या तावडीतून सोडवले. भरत तिला चरणस्पर्श करायला आले तेव्हा त्यांचे डोळ्यात केवळ आदर आणि ममत्व होतं.पश्चातापदग्ध असल्यामुळे शब्दही उच्चारु शकले नाही.तिने त्यांना मिठीत घेतले.त्या मौन मिठीतून माता- पुत्राचं मन मोकळं झालं.आजवर गमावलेला आणी कमावलेला सर्व हिशोब पूर्ण झाला.भरतासारख्या पवित्र आणि निःस्वार्थी पुत्राची माता म्हणून तिचा सन्मान तिला परत मिळाला. नंतर सीता आपल्या कक्षात उर्मिलाला घेऊन गेली.म्हणाली,तुझी आणि लक्ष्मणाची भेट होण्याआधी,तुझ्या शी बोलण्याआधी माझ्याकडून घडलेल्या अक्षम्य अपराधाची कबुली द्यायची आहे. हे ऐकताच उर्मिलाच्या चेहर्‍याचा रंग उडाला.आणखी काय ऐकायला मिळेल याची विचित्र जाणीव झाली.सीते,आतां अंत नको पाहूस,काय सांगायचे ते पटकन सांग,माझा जीव टांगणीला लागलाय!

सीता धीर एकवटत म्हणाली, उर्मिला,मी लक्ष्मणांची अत्यंत हिडीस शब्दात संभावना केली.त्या कांचनमृगा पायी हे सर्व नाट्य घडले. आणि मग कांचनमृग दिसल्यावर हट्टाने रामाला ते मृग आणायला सांगीतल्यापासून ते रामा ची आर्त किंकाळी ऐकू आल्यावरही मी किती विनवले तरी, लक्ष्मण मदतीला जात नाही तेव्हा त्यांची अतिशय गलिच्छ शब्दात संभावणा केल्यावर,पिळवटलेला संतापलेल्या चेहराही मला दिसला नाही. तरी निघण्याअधी मला वारंवार बजावल कुटीभोवती आखलेली रेषा कोणत्याही परिस्थितीत ओलांडायची नाही. हे निक्षून सांगितल्यावर भिक्षा वाढण्यासाठी रेषा ओलांडली व माझे अपहरण झाले.हे सर्व सांगून,सीता म्हणाली,लक्ष्मणासारख्या अत्यंत पुण्यवान आणि सदाचारी पुरुषा वर मी अतिशय घृणास्पद आळ घेतला. ज्याने सर्व सुखाचा त्याग करुन,निस्वार्थ सेवा करत,पाठच्या भावासारखे रक्षण केले त्याच्याच आत्म्याला क्लेष होईल असे बोलले.त्या पापाचं मला प्रायश्चित मिळालं.येवढे भोग सोसावे लागले. सीता तूं उगीच सांगीतले,लक्ष्मणां नी मला कधीच सांगीतले नसते.कां? ते तर तुला प्रत्येक गोष्ट सांगतात ना?गंभीर पणे उर्मिला म्हणाली,तुझ्याचसाठी!माझ्या नजरेत तुझी प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून….आतां तुला माझा तिरस्कार वाटत असेल ना ग?अगऽ आपलं प्रेम एवढं तकलादू आहे का?उर्मिलाने तिचा अपराधबोध कमी व्हावा या हेतूने कुशीत घेत म्हणाली,जे घडायचं ते घडून गेलं,तूं परत मिळाली यापेक्षा आणखी काय हव दोघी बहिणींनी एकमेकींच्या मिठीत अश्रूं ना मोकळी वाट करुन दिली…. कक्षातील मंचकावर लक्ष्मणाची वाट बघत असतांना चलचित्राप्रमाणे अगदी सुरुवाती पासूनचे प्रसंग डोळ्यासमोर सरकत होते.लक्ष्मणाचा प्रवेश झाल्यावर उर्मिला विचारांच्या गर्तेतून बाहेर आली. सर्व विसरुन त्यांच्या मिठीत विसावली. मिलनाच्या या अनोख्याक्षणी कुठलीही दुःखद आठवण नको होती. हळूहळु ती सावरली.त्यांनी तिला अवधी दिला.किती तरी वेळ दोघे तसेच मिठीत विसावले. होते.सौख्य,शांती,समाधानाची अनुभुती दोघांनाही येत होती.चौदा वर्षाचे पारणे फिटत होते. यथायोग्यवेळी उर्मिला-लक्ष्मणाला अंगद आणि चित्रकेतू ही दोन मुलं झाली. सीता गर्भार असतांनाच एका धोब्याने आरोप केल्यावरुन रामाने सीताला अरण्यात सोडून देण्याची कामगिरी लक्ष्मणावर सोपवली. ती खंत लक्ष्मणाच्या मनातून शेवटपर्यत गेली नाही. लक्ष्मण जगला तो रामासाठी आणि मृत्यु ही पत्करला तो रामासाठीच! आयुष्यभर ज्याने आपल्या जेष्ठ बंधूची आज्ञा पाळली,त्याने सर्वनाश टाळण्यासाठी अवाज्ञा केली म्हणून मृत्यु स्विकारावा लागला. विध्द झालेल्या सीताने स्वतःला भूमातेला अर्पण केले.आपल्या प्रिय बंधूचे जो जीवनभर सावली होऊन राहिला त्याच्या मृत्युचे दुःख रामाला असह्य झाल्याने लव कुश या जुळ्या पुत्रांवर राज्यकारभार सोपवून शरयूनदीमधे जलसमाधी घेतली भरत शत्रृघ्ननेही रामाचे अनुकरण केले. रामराज्याची वाटणी झाली.अयोध्ये च्या उत्तर कौशल प्रांतावर लव तर दक्षिण कौशल प्रातांवर कुश राज्यकारभार करुं लागले.भरतपुत्र तक्ष आणि पुष्कल हे गांधार प्रांतावर राज्य करुं लागले. तक्षशिला ही त्यांची राजधानी होती. शत्रृघ्ननाने आपले पुत्र सुबाहू आणि शत्रृघती या दोन पुत्रांना मथुरा आणि विधिशाचं राज्य,आणि लक्ष्मणाने आपले पुत्र अंगद आणि चित्रकेतू यांना करुपदेश हा मिथिला जवळ असलेला भाग दिला.मिथिला त्यांची माता उर्मिलाची जन्मभूमी होती. आणि उर्मिला ती मात्र अजूनही उपेक्षित…दुःख अन्याय झेलत “सामान्य” स्रीच्या रुपात न थकता,न थांबता अविरत घेतलेला वसा पुढच्या पिढीला देत…कारण अजून तिचा वनवास संपायला ना कुठला राम आला ना लक्ष्मण… प्रत्येक पिढीतील ही “उर्मिला” मात्र खंबीर होत चालली आहे.. आयुष्यातील प्रत्येकच लढाई लढायला तिला आतां कुठल्या लक्ष्मणाची गरजच उरली नाही.. स्वतःचा उध्दार करायला आतां तिला “राम लक्ष्मणाच्या” देवळांत जावं लागत नाही… अशा या त्यागमयी खंबीर “पंडिता” उर्मिलाला कोटी कोटी प्रणाम !

                                                               || जय जय रघुवीर समर्थ ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *